मिशनची स्थापना

अस्पृश्यवर्गीय लोकांची अस्पृश्यता नष्ट करावी व त्यांची स्थिती सुधारावी ह्या हेतूने एक मिशन काढून विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यवर्गासाठी अशा प्रकारचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करू इच्छितात ही वार्ता प्रसृत झाली. ह्या कामाला अनुकूल अशा प्रकारचा प्रतिसाद प्रार्थनासमाजाचे उदार उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांच्याकडून मिळाला. १६ ऑक्टोबर १९०६ रोजी शेठ दामोदरदास ह्यांनी अशा प्रकारची मंडळी स्थापन करण्यासाठी एक हजार रुपयाची देणगी दिली. दोनच दिवसांनी दिवाळी-पाडव्याच्या शुभदिनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी कार्तिक वद्य प्रतिपदेस शिंदे ह्यांनी ह्या कामाला आरंभ करण्याचे ठरविले. सकाळी ९ वाजता मुंबई येथील एल्फिन्स्टन रोडलगतच्या मुरारजी वालजी ह्यांच्या बंगल्यात भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरिता प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष न्या. चंदावरकर ह्याप्रसंगी रा. ब. नारायण त्रिंबक वैद्य, रा. बाळकृष्ण नारायण भाजेकर वगैरे बरीच समाजाची हिंतचिंतक मंडळी समारंभास आली होती. सुबोधपत्रिकेने ह्याबद्दलची बातमी देताना असे म्हटले आहे, “अस्पृश्य मानलेल्या लोकांकरिता व इतर गरीब लोकांकरिता येथील प्रार्थनासमाजाशी निकट संबंध असलेल्या काही मंडळींनी ही शाळा स्थापन केली.” ह्या शब्दप्रयोगावरूनही शाळा प्रार्थनासमाजाच्या वतीने उघडण्यात आली नसून नव्याने स्थापन होणा-या एका वेगळ्या मंडळीच्या वतीन ही शाळा सुरू होत आहे हे सूचित होते. ह्या बातमीच्या शीर्षकामध्येही ‘नीच मानलेल्या लोकांकरिता नवीन शाळा’ असे म्हटले आहे.१

“समारंभाच्या आरंभी ईशस्तवनाचे एक पद्य म्हटल्यावर रा. ब. काशीनाथ बाळकृष्ण मराठे ह्यांनी ईश्वरप्रार्थना करून प्रसंगास अनुरूप असे उपदेशपर भाषण केले. त्यावर रा. रा. विठ्ठल शिंदे, समाजाचे धर्मप्रचारक ह्यांनी नीच मानिलेल्या जातीविषयी थोडी माहिती सांगितली. देशातील एकंदर प्रजेपैकी एकसप्तमांश प्रजा अशा वर्गातली आहे असे त्यांनी मनुष्यगणतीच्या आधारे ह्याविषयावर एक नुकताच लेख प्रसिद्ध केला आहे, त्याचा उल्लेख करून सांगितले. ह्या लोकांस आम्ही विद्या देऊन शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत पण त्यांना वरच्या पायरीस घेण्यास लोकांनी तयार झाले पाहिजे असे ते म्हणाले.” ह्या प्रसंगी रा. रा. भाजेकर व सदाशिव पांडुरंग केळकर ह्यांचीही भाषणे झाली. शेवटी न्या. चंदावरकर ह्यांनी भाषण केले. त्यात ते म्हणाले की, “ह्या लोकांस खाली ढकललेले लोक (डिप्रेस्ड क्लासेस) असे वारंवार म्हणण्यात येते, पण खरे पाहिले तर आम्ही सर्वजण अशा नीच पदास पोहोचलो आहोत, तेव्हा आम्ही उच्च व तुम्ही नीच असे कोणास म्हणावयास नको. आम्ही सर्वांनीच आपली नीच  झालेली स्थिती सुधारण्याचा यत्न केला पाहिजे.” ह्या प्रसंगी न्या. चंदावरकर ह्यांनी आपल्या भाषणात जे सूत्रवाक्य सांगितले ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, “ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःला वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणात न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हामध्ये निरंतर जागृत राहो.”२

एकदा कार्याला प्रारंभ केल्यावर शिंदे ह्यांनी मिशनच्या कामाची पद्धतशीर मांडणी केली. एक मध्यवर्ती संस्था ठरवायची व तिचा हेतून आणि रचना ह्यासंबंधी आवश्यक तेवढेच नियम करावयाचे असे त्यांनी धोरण ठरविले. मातृसंस्था मुंबईत स्थापन करण्यात आली. प्राथमिक अथवा दुय्यम शिक्षणाची शाळा, उद्योगशाळा, विद्यार्थिवसतिगृहे, मोफत दवाखाना, धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या साप्ताहिक शाळा, केवळ सार्वत्रिक धर्माला अनुसरून म्हणजे जातिभेद आणि मूर्तिपूजा ह्यांना फाटा देऊन चालविण्यात येणारी उपासनालये एवढी निदान या मध्यवर्ती संस्थेची अंग असावीत, असे ठरविले. कार्याचा पुढे जसजसा अनुभव येईल त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रांतांतून भाषावार प्रांतिक शाखा आणि त्यांच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय पोटसंस्था स्थापन करण्याचा विचार ठरला. शिंदे ह्यांनी स्थानिक कार्यावर लक्ष केंद्रित करून ते काम पद्धतशीरपणे करणे ह्याला सुवर्णकार पद्धती असे म्हटले आहे व मोठ्या प्रमाणावर सर्व लोकांसाठी जाणीव उत्पन्न करण्याच्या स्वरूपाच्या कामाला मेघवृष्टीची कार्यपद्धती असे म्हटले आहे. मेघवृष्टीचे काम जाहीर व्याख्यानांद्वारे होते. प्रचाराच्या कामाची जबाबदारी स्वतः शिंदे ह्यांनी पत्करली तरी, सुवर्णकार पद्धतीच्या कामासाठी आजीव कार्यावाह मिळविणे आवश्यक होते.

मिशनच्या ह्या कामासाठी माणसे मिळविण्याचा प्रयोग शिंदे ह्यांनी स्वतःच्या घरापासूनच केला. घरच्या लोकांना घेऊन थोडेसे काम करून दाखविल्यावर आपले आध्यात्मिक घर म्हणजे प्रार्थनासमाज येथून आपल्याला माणसे मिळतील अशी त्यांची बळकट श्रद्धा होती. मिशनच्या मध्यवर्ती शाखेतील पदाधिकारी हे प्रार्थनासमाजातील पदाधिकारी होते. अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित, सुपरिटेंडेंट डॉ. संतुजी रामजी लाड व मिशनचे जनरल सेक्रेटरी स्वतः शिंदे राहिले. कार्यवाहक म्हणून त्यांनी पनवेल येथे म्युनिसिपालटीच्या मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका असणा-या भगिनी जनाबाई ह्यांना त्यांनी बोलावून घेतले. प्रार्थनासमाजाच्या कामामध्ये उपासनेच्या वेळी भजन करणे, प्रसंगविशेषी गोरगरिबांचा समाचार घेणे वगैरे कामे त्या आधीपासून करीत होत्याच. मिशनच्या अण्णासाहेबांच्या कामात सहभागी होण्याच्या सूचनेवरून जनाबाईंनी पनवेलच्या शाळेतील मुख्याध्यापिकेच्या पदाचा राजीनामा दिला व मिशनच्या कामामध्ये त्या सामील झाल्या. अण्णासाहेबांचे आई-वडीलही आपल्या मुलांच्या पाठीमागे आले व मिशनच्या कामामध्ये शक्य होईल ती मदत त्यांना करू लागले. त्यांच्या घरोब्याचे सय्यद अब्दुल कादर हे मॅट्रिक पास झालेले तरुण मुंबई येथील इस्लामिया स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करीत होते. शिंदे ह्यांच्या प्रभावाने त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली होती. त्यांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते मिशनचे आजीव कार्यवाह बनले. मुंबई प्रार्थनासमाजाचे दुसरे निष्ठावंत सभासद श्री. वामनराव सदाशिवराव सोहनी हे विल्सन हायस्कूलमध्ये नावाजलेले शिक्षक होते. प्रार्थनासमाजाच्या कामात व विशेषतः रात्रशाळेच्या कामात ते लक्ष घालीत असत. तेही मिशनच्या कामासाठी शिंदे ह्यांना येऊन मिळाले. ही सर्व मंडळी मिशनच्या कामाला स्वार्थत्यागपूर्वक तयार झालेली पाहून शिंदे ह्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.

मिशनचे हेतू पहिल्यापासूनच पुढीलप्रमाणे ठरविलेः १) हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, पारिया वगैरे (विशेष करून पश्चिम हिंदुस्थानातील) अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, २) नोक-या मिळवून देणे, ३) सामाजिक अडचणींचे निवारण करणे, ४) सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील आणि नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार ह्या गरीब लोकांमध्ये करणे.

ह्या वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रयत्न काहीएक प्रमाणात स्थानिक पातळीवर केले जात असत. मात्र शेवटचे तीन हेतून केवळ मिशन निघाल्यामुळेच साधणे शक्य होणार होते. मिशनचे काम उदार धर्माच्या पायावर उभारण्यात आले. त्यासाठी दर शनिवारी व्याख्याने आणि कीर्तने होत. रविवारी सकाळी धार्मिक शिक्षणाचे वर्ग आणि सायंकाळी उपासना होत. प्रारंभी हे काम स्वतः शिंदे व त्यांच्या भगिनी जनाबाईही करीत असत. सणाच्या दिवशी सामाजिक मेळे भरविण्यास त्यांनी सुरुवात केली. अस्पृश्यवर्गीय स्त्री-पुरुष, वरिष्ठवर्गातल्या स्त्री-पुरुषांमध्ये समानतेच्या नात्याने भाग घेत. पहिल्या वर्षी ९ जाहीर व्याख्याने, ४ कीर्तने, ५ पुराणवाचने असे कार्यक्रम झाले.

पहिल्या वर्षातच मिशनच्या कामाने जोरात वेग घेतला. मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून शिंदे ह्यांनी तयार केलेला तिस-या तिमाहीचा अहवाल ९ जुलै १९०७ ह्या तारखेस प्रसिद्ध झाला. तो ‘इंडियन सोशल रिफॉर्मर’ने प्रसिद्ध केला.

मिशनच्या सुरुवातीच्या काही अहवालांमध्ये मिशनचा उद्देश सांगताना काही आकडेवारी देण्यात येत असे. पहिल्या अहवालात दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणेः
हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्याः २९ कोटी ४३ लक्ष ६१ हजार ०५६ पैकी एकूण हिंदूंची संख्या २० कोटी ७१ लक्ष ४७ हजार २० पैकी अस्पृश्य मानलेल्यांची संख्या ५ कोटी ३२ लक्ष ६ हजार ६३२. हे आकडे देऊन पुढे असे म्हटले आहे की, दर ७ हिंदुस्थानी माणसामागे १ दुर्दैवी अस्पृश्यप्राणी आहे की जो बोलण्याच्या अंतराइतका जवळ येऊ शकत नाही.” मुंबई इलाख्यात अस्पृश्य मानलेल्यांची लोकसंख्या हिंदूंच्या १७ टक्क्यांइतकी आहे. मुंबई शहराची लोकसंख्या ९ लाख ८२ हजार एवढी आहे. त्यांपैकी अस्पृश्यवर्गाची लोकसंख्या ८३ हजार १४ एवढी आहे. मात्र शाळेत जाणा-या अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३०० आहे. ह्या आकडेवारीवरून अस्पृश्य मानलेल्या वर्गाची स्थिती सुधारणे किती निकडीचे आहे हे ध्यानात येते, असे नमूद केले आहे. ह्या अहवालासोबत शिंदे ह्यांचा ‘मिशन काढण्याची आवश्यकता’ ह्या विषयावर इंग्रजी लेख प्रसिद्ध केला आहे.

मिशनने पुढील संस्था सुरू केल्याः १) मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशा मोफत दिवसाच्या २ शाळा(मराठी ५वी आणि ३-या वर्गापर्यंत), २) नोकरी करणा-या लोकांसाठी रात्रशाळा, ३) धर्मार्थ दवाखाना, ४) वाचनालय व ग्रंथालय, ५) मुलांसाठी तालीम, ६) महिलांसाठी शिवणवर्ग, प्रार्थना व व्याख्याने.

ह्याच अहवालामध्ये मुलांसाठी माध्यमिक शाळा, मुलींसाठी माध्यमिक शाळा, उद्योगशाळा व ग्रामीण भागांतून आलेल्या गरीब होतकरू मुलांसाठी वसतिगृहे असे नवीन उपक्रम सुरू करण्याचा मनोदय प्रकट केला.

२८ फेब्रुवारी १९०७ ह्या दिवशी परळ येथील ग्लोब मिलजवळील शाळेच्या जागेत होळीच्या निमित्ताने एक समारंभ आयोजित करण्यात आला. ह्या समारंभासाठी शेठ दामोदरदास सुखडवाला, गोकुळदास पारेख, सौ. रमाबाई भांडारकर, काशीताई नवरंगे इत्यादी स्त्री-पुरुष उपस्थित राहिली होती. ह्या प्रसंगी शिंदे ह्यांचे ‘शिमगा सणातील चांगले व वाईट प्रकार’ ह्या विषयावर उद्बोधक भाषण झाले. सायंकाळी ६ वाजता मुख्य पाहुणे सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर हे उपस्थित झाले. शिंदे ह्यांनी स्वागतपर भाषणामध्ये मिशनने केलेल्या कामाचा आढावा घेतला. मिशनमध्ये सध्या दोन पुरुष व दोन स्त्री शिक्षक असून त्यांपैकी शिक्षिका विनावेतन काम करतात अशी माहिती दिली.

फेब्रुवारी १९०७ अखेरपर्यंत दिवसाच्या शाळेत खालीलप्रमाणे विद्यार्थी येत होते.
दिवसाची शाळा : प्रारंभ १८ ऑक्टोबर १९०६
 

 

विद्यार्थी महार मांग चांभार इतर हिंदू एकंदर विद्यार्थी
मुलगे ७७ २३ ३७ -
मुली १८ -
एकंदर ९५ २७ ४५ १७२

 

डिसेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने एक रात्रशाळा सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे दर रविवारी सकाळी धार्मिक व नैतिक शिक्षण देण्यासाठी मुलांचे वर्ग भरविण्यात येत. सुमारे २५ मुले हजर असत. ही नीतिशिक्षणाची शाळा १८ ऑक्टोबर १९०६ रोजी सुरू करण्यात आली. २२ नोव्हेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. ४ महिन्यांच्या अवधीत महार, चांभार, इतर हिंदू, मुसलमान व ख्रिश्चनवर्गातील १०९ आजारी व्यक्तींनी औषधोपचाराचा लाभ घेतला. डॉ. संतुजी रामजी लाड हे दररोज सकाळी ठाण्याहून येऊन टार तास रोगी पाहण्याचे काम करीत असत. डॉ. लाड केवळ दवाखान्यातच काम करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत. डॉ. लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस. पी. नाशिककर हेही मिशनच्या दवाखान्याचे काम पाहत असत.

शेठ तुकाराम जावजी, बाबाजी सखाराम आणि कंपनी आणि मनोरंजक प्रसारक ग्रंथ मंडळ ह्यांनी पुस्तकाची मदत केल्यामुळे मिशनच्या वतीने एक ग्रंथालय जानेवारी १९०७ मध्ये उघडण्यात आले. ग्रंथालयात २३२ पुस्तके जमा झाली.

बुकबाइंडिंगचे काम दोन महार विद्यार्थी मिशनमध्ये शिकू लागले होते.

होळीच्या दिवशी होणा-या गैरप्रकाराला आळा बसावा ह्या हेतूने मिशनच्या भायखळा आणि परळ ह्या ३ शाळांच्या ठिकाणी मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने दारूच्या दुष्परिणामावर व्याख्याने देण्यात आली. तीन रात्री चांदण्याच्या प्रकाशामध्ये मिशनच्या शाळांतील मुले व परिसरातील माणसे स्वदेशी खेळ खेळत होते. ह्या खेळाचे संयोजन प्रार्थनासमाजातील काही तरुणांनी केले.

जनरल सेक्रेटरी शिंदे ह्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर ह्यांनी मुलामुलींना पारितोषिके दिली व मिशनने चालविलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. इतर ठिकाणी व्यसनात गढून प्रचंड गोंधळ चाललेला असताना ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यसनापासून दूर राहून मुले-माणसे खेळामध्ये भाग घेत आहेत हे चित्र आपल्याला फार आशाजनक वाटले असे त्यांनी सांगितले.

ह्या समारंभानंतर सर भालचंद्र ह्यांनी पायाने फूटबॉल उडवून मैदान क्लबचे उदघाटन केले.

मिशनच्या कामाचा चहूकडे बोलबाला होऊ लागला. ह्या नवीन कार्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल मते वृत्तपत्रकार प्रसिद्ध करू लागले. ह्या काळातच अखिल भारतीय पातळीवरील अन्य संस्था सुरू होऊ लागल्या होत्या. गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली होती. धोंडोंपंत कर्वे ह्यांनी अनाथ महिलाश्रम आधीच स्थापन केले होते. अशा ह्या काळात मिशनचे काम सुरू झाले होते. ह्या सुमारास मुंबईत कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता परोपकारी कृत्ये करणारे दोन दानशूर गृहस्थ होते. एक, मलबारी नावाचे पारसी व दुसरे दयाराम गिडुमल.

एके दिवशी दयाराम गिडुमल ह्यांच्याकडून शिंदे ह्यांना आपल्याला समक्ष भेटून जावे अशाबद्दलची चिठ्ठि आली. शिंदे भेटीला गेल्याबरोबर त्यांना आपलेपणाने कवटाळून डोळ्यांत आसवे आणून विचारले की, हे अपूर्व मिशन काढण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? ह्या कामी अस्पृश्यवर्गातल्या महिलांसाठी तुम्ही काही तजवीज केली आहे काय? त्यावर शिंदे ह्यांनी स्पष्टपणे सांगितले, “ह्या हतभागी भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची स्थिती अत्यंत दुर्बल व केविलवाणी आहे. हे मी जाणून आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या घरातल्या मंडळींनाही ही जाणीव असल्याने माझी त्यागी बहीण आणि पूज्य माता यांनी पाठबळ दिले आहे.”३ ही वार्ता दयारामजींच्या कानावर अगोदरच आली होती. म्हणूनच त्यांनी शिंदे ह्यांना समक्ष भेटीला बोलावून असे कळकळीचे स्वागत केले. अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी मिशनच्या मध्यवर्ती आश्रमात ‘निराश्रित सेवासदन’ ह्या नावाखाली एक स्वतंत्र शाखा काढण्याची तयारी शिंदे यांनी दाखविली. ह्या कार्यासाठी दयारामजींनी दरमहा १०० रुपयांची मदत देऊ केली आणि त्याप्रमाणे सदन निघाले. मिशनच्या तिस-या तिमाही अहवालात सेवासदन सुरू झाल्याचे वृत्त असून एका दानशूर परोपकारी गृहस्थांनी दरमहा १०० रु. ची मदत ह्या सदनासाठी देऊ केली आहे, असा उल्लेख आढळतो. दयारामजींनी आपले नाव गुप्त ठेवण्याबद्दल शिंदे ह्यांना सांगितले असले पाहिजे.

निराश्रित सेवासदनातील स्त्रीप्रचारकांना विविध प्रकारची कामे करावी लागत. अस्पृश्यवर्गीय मुलांसाठी नुसत्या शाळा काढून उपयोग नव्हता. कारण ह्या मुलांना रोजच्या रोज शाळेत जाण्याची सवय नसे व पालकांना रोजच्या रोज पाठवण्याचे महत्त्व वाटत नसे. शिक्षणाची अभिरुची लावून देण्यासाठी सदनातील स्त्रीप्रचारकांना घरोघरी जाऊन भेटी घ्याव्या लागत असत. हे काम करणा-या स्त्रिया ह्या ख्रिस्ती प्रचारक असल्या पाहिजेत असा अनेकांचा गैरसमज होऊ लागला. तो दूर करण्यासाठी या प्रचारक स्त्रियांनी भारत, भागवत, रामायण अशा हिंदू धर्मग्रंथांचे घरोघरी वाचन सुरू केले. आजा-यांची शुश्रुषा करण्यासाठी आणि बाळंतपणात मदत देण्यासाठी सदनातील स्त्रियांना शिक्षण देऊन तयार करण्यात आले. श्रीमती वेणूबाई, द्वराकाबाई आणि श्रीमती कल्याणीबाई सय्यद ह्या तीन स्त्रिया सदनात राहून ही कामे उत्तम रीतीने करीत असत. सदनातील घरगुती कामे शिंदे यांच्या भगिनी जनाबाई पार पाडीत. बाहेरच्या कामाचा सर्व बोजा सय्यद अब्दुल कादर यांनी उचललेला होता. ह्या कामासाठी निराश्रित महिला समाज ही निराळी संस्थाच जनाबाईंनी काढली. या महिलासमाजाचा पहिला वार्षिकोत्सव सौ. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. ह्यावेळी सौ. कल्याणीबाई सय्यद यांनी वाचलेल्या रिपोर्टात पुढील माहिती आहेः “घरातील वर्ग सुमारे ६ महिने चालले. गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूती करण्यात आली. पुष्कळांना दवाखान्याचा लाभ मिळाला. घरोघरी भेटी देऊन समाचार घेण्याचे काम वर्षभर चालले होते. पोलीस कमिशनरांकडून बेवारशी मुले व बायका मिळून पाच व्यक्ती आल्या, त्यांची निगा ठेवण्यात आली.”४

हया तिस-या तिमाही अहवालात विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा उल्लेख असून सुरू केलेली कामे जोरात चालू असल्याचे नमूद केले आहे. मिशनमध्ये विल्सन हायस्कूलमधील नव्याने राहण्यास आलेल्या गणेश आकाजी गवई ह्या महार विद्यार्थ्याचा निर्देश केला असून सेवासदनामध्ये त्याच्या राहण्याजेवण्याची मोफत सोय करण्यात आली असून होणा-या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला बसणार असल्याची माहिती दिली आहे. (सदर विद्यार्थी म्हणजेच पुढे प्रसिद्धीस आलेले मध्यप्रदेश कायदेकौन्सिलचे सदस्य झालेले प्रख्यात महार पुढारी होत.)

अस्पृश्य लोकांकरवीच स्वतःच्या उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेण्याच्या उद्देशाने पुरुषांसाठी सोमवंशीय मित्रसमाज ही संस्था २४ मार्च १९०७ रोजी भायखळा येथे इंप्रूव्हमेंट चाळीमध्ये स्थापन करण्यात आली. प्रारंभी १४ नियमित सदस्य पटावर नोंदले गेले. ही मंडळी दर शनिवारी रात्री मदनपु-यातील दगडी चाळीत भाड्याने घेतलेल्या एका खोलीत आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एकत्र करीत. प्रारंभी भोजन झाल्यानंतर एखाद्या उपयुक्त विषयावर भाषण होई. मिशनचे प्रतिनिधी अधूनमधून तेथे जात असत. देवनार येथील म्युनिसिपल कॉलनीत राणा-या ५०० अंत्यजवर्गीयांसाठी एक दिवसाची व एक रात्रीची शाळा काढण्याची मिशनला गरज वाटू लागली. काही विशेष प्रसंगी ही मंडळी परळ येथील शाळेमध्ये येत असत.

मिशनचा वार्षिक खर्च सुमारे ३ हजार रुपयांइतका झाला. मिशनचे वाढते काम लक्षात घेता श्रीमंत, परोपकारी देशभक्तांनी त्याचप्रमाणे निराश्रित समाजाच्या मित्रवर्गांनी मिशनने चालविलेल्या उदात्त कामासाठी मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन शिंदे ह्यांनी अहवालाच्या अखेरीस केले आहे. इंडियन सोशल रिफॉर्मरने हा संपूर्ण अहवाल छापून धनिकवर्गाने व नागरिकांनी मदत करण्याची आवश्यकता कशी आहे हे अखेरीस नमूद केले.५

स्थापनेपासूनच्या तीन वर्षांच्या अवधीत मिशनने कामाचा मोठाच विस्तार केला.