1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

नाममंत्राचे सामर्थ्य

(रविवार ता. १७-३-१९११ रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या तिस-या जयंती निमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.)

नाममंत्र आहे सोपा । अविश्राम चाळी पापा ।।
जो का निश्चय धरील । नाम तया उद्धरील ।।
नर नारी कोणी याती । नाम ठेवे एके पंक्ती ।।
तुका म्हणे या नामाने । कृपा केली भगवंताने ।।

आता ज्या साधूचा अभंग गाईला त्या तुकाराम महाराजांच्या चरित्राची कालच (ता. १६ रोजी) आपण ओळख करून घेतली. ते कसे वाढले, संसारात असताना त्यांनी कसे दिवस काढले, ईश्वराच्या सेवेत ते कसे राहिले, लोकांस त्यांनी सन्मार्ग कसा दाखविला, संकटास त्यांनी कशी पाठ दिली, शत्रूंशीही ते कसे वागले वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान आपण करून घेतले आहे. असे जे साधूंत श्रेष्ठ साधू तुकाराम महाराज त्यांनी सर्वकाल भजनात, देवाच्या सेवेत घालविला हे खरे. पण, त्यांनी आमच्यासाठी मागे काही निरोप ठेविला आहे काय, काही आनंदाची बातमी, काही विश्रामाचे स्थान, संसारात असताना काही समाधानाची जागा असे काही ठेविले आहे, किंवा काही शुभ वर्तमान गाजविले आहे काय, असे वारंवार मनात येते. त्यास ह्या अभंगात संपूर्ण उत्तर मिळणार आहे. होय. तुकाराम महाराजांनी आपल्या मागे मोठा निरोप ठेविला आहे, आनंदाची बातमी आम्हा सर्वांच्यासाठी ठेविली आहे. तथा थकलेल्या भागलेल्यास विश्रांतीचे स्थान ठेविले आहे. आम्ही मात्र आपली तयारी केली पाहिजे. आणि हा निरोप, ही बातमी, हे शुभवर्तमान सर्व काही, ह्या एका अभंगामध्ये भरून आहे. ह्या अभंगाच्या प्रत्येक ओळीमध्ये हे आनंदाचे वर्तमान ओतप्रोत भरलेले आहे. त्याचा स्वीकार करण्याची मात्र आमची तयारी पाहिजे. पहा ह्या अभंगाच्या द्वारे तुकोबा काय संदेश पोहोचवीत आहेत तो !

मनुष्यजन्माचा किती थोर अधिकार आहे ! मनुष्यजन्म प्राप्त होणे म्हणजेच आमची जणू काय पापापासून मुक्तता होणे आहे. परंतु असे असून ह्या मुक्तीच्या, ह्या पापविमोचनाच्या गोष्टी सांगावयाच्या सोडून आम्ही अधिकाधिक पापात पडतो आणि रात्रंदिवस पापाच्याच गोष्टी सांगतो ! इतर प्राणी पुष्कळ आहेत, सर्प आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, दुसरे अनेक हिंस्र पशू आहेत, पक्षी आहेत, त्या सर्वांना आत्मे आहेत. पण त्यांना मन नाही. त्यांच्या ठिकाणी स्वतःच्या संबंधाने काही जागृती नाही. काही जाणीव नाही. यातना होत असल्या तरी कालच्या यातनांची आज आठवण नाही, उद्याविषयीची कल्पना नाही. आम्हांला मन मिळाले आहे, आम्हांला बुद्धी आहे. पापदग्ध करून टाकणारा हा अमोलिक मनुष्यजन्म सापडला आहे. आणि आम्ही त्याचे सार्थक करून घेत नाही. देवाच्या नामाचा हा सोपा मंत्र जणू काय सापडला असून त्याची आम्ही हेळसांड करतो, पापकर्माचा इतका ढीग करतो, परस्परांच्या हेव्यामध्ये इतके गुंततो, संशयाने आपली मने इतकी दूषित करून घेतो, मत्सराने इतके वेडावून जातो, ज्ञानी असून अज्ञानाचा इतका पसारा मांडतो, प्रेम-निष्काम प्रेम-करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये ठेविले असून सूड घेण्याच्या बेतामध्ये इतके गुंग होतो की त्यामुळे अगदी हिंस्र, अगदी क्रूर, अधिक कृतघ्न, अधिक दुष्ट होतो व आपल्या थोर अधिकारास मुकतो ! हे पाहून तुकोबा सांगताहेत असे भांबावू नका, असे सैरावैरा पळू नका. हा नाममंत्र अगदी सोपा आहे. दुसरे लोक जादू टोण्याचे मंत्र पुष्कळ सांगत असतात. परंतु त्या सर्वांहून हा मंत्र सोपा आहे, ह्याचे सामर्थ्य अपार आहे. तुम्ही कितीही अपार पापे केलीत, पापांचे ढीग रचिलेत तरी एका क्षणामध्ये त्यांची राख करून टाकणारा हा मंत्र आहे ! एके बाजूला तुमची अपार पापे आणि दुस-या बाजूला प्रेमाची मूर्ती पण परम सामर्थ्यवान परमेश्व असा हा संबंध आहे. त्यामुळे त्या देवापुढे तुमच्या पापांचा तो काय टिकाव लागणार आहे ? मात्र तुम्ही ह्या सोप्या नाममंत्राचा निश्चयाने आश्रय केला पाहिजे. हा धर्म नवीन आहे म्हणून बुझून जाऊ नका. कोणतीही संकटे आली, कसेही प्रसंग आले तरी देवाचे नाव सोडावयाचे नाही, देवाच्या सेवेला मुकावयाचे नाही त्याचा जो हा मार्ग त्याच्यापासून एक रतिभरही मागे सरावयाचे नाही अशा निर्धाराने, अशा दृढ निश्चयाने ह्या संसारात फिरा, कर्मे करा, वावरा, आनंदाने रहा, सेवेत रत रहा म्हणजे पहा तुमच्या हातून कितीही पापे झाली असली तरी एका क्षणामध्ये ती दग्ध होतील. मात्र तुमच्या ठिकाणी निश्चयाचे बळ असले पाहिजे.

असा ज्यांचा जागता निश्चय आहे, असे ज्यांचे बळ आहे, ते पुरुष आहेत की त्या स्त्रिया आहेत, ते उच्च जातीचे आहेत की ते खालच्या वर्गातील आहेत, ते भाग्यवान की भाग्यहीन आहेत, ते श्रीमंत आहेत की गरीब आहेत, ते अधिकारी आहेत की नाहीत, ह्याचा मग विचार नाही. हे देवाचे नाव सर्वांना एका पंक्तीला नेऊन बसविते. उच्चनीचपदाचे भेद आम्ही क्षुद्र मनुष्यांनी केलेले. धन द्रव्याचे भेद हे निरनिराळ्या कारणांचे, निरनिराळ्या परिस्थितीचे परिणाम होत. नाममंत्राच्या आवारात त्यांचा प्रवेश नाही. तेथे सर्वांची पंगत एक, सर्वांची जात एक, सर्वांचा धर्म एक, मात्र आमचा निर्धार पाहिजे. आमचा निश्चय जितका बलवान तितका ह्या मंत्राचा परिणाम अधिक सुस्पष्ट आमच्या अनुभवास येतो. ह्या निशचयाची, ह्या निर्धाराची, मनाच्या तयारीची आपणाला दोन उदाहरणे सांगतो. गौतमबुद्धांनी लोकांस नवीन वाटणा-या धर्माची स्थापना केली. लोकांना ज्या गोष्टी नवीन वाटत होत्या त्या त्यांनी मोठ्या निर्धाराने प्रचारात आणल्या. पुरातन मार्गाचा त्याग केला. तो मार्ग खरा नव्हे असे सांगत सांगत ते संचार करू लागले. त्यामुळे त्यांस ज्याप्रमाणे अनुयायी मिळाले त्याचप्रमाणे अनेक शत्रूंचीही जोड त्यांना लाभली ! त्यांच्या शुभवर्तमानाच्या योगे ज्यांची चित्तवृत्ती अगदी क्षुब्ध झाली होती, त्यांना हा नवा धर्म अधर्म आहे असे वाटत होते. असे एक गृहस्थ एकदा गौतमबुद्धांपाशी गेले आणि त्यांनी त्यांस मनसोक्त शिव्या देण्यास प्रारंभ केला ! त्यांची त्यांनी वाटेल तशी निर्भर्त्सना केली ! परंतु त्याचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही ! आम्हांला कोणी एक शिवी देणार असे वाटले की, ती त्याच्याकडून स्पष्टपणे बाहेर येईल अशी आमची वृत्ती होते. मग त्याने एक दिली तर आमच्या दोन होतात, त्याच्या सहा तर आमच्या बारा असे होऊन आम्ही दोघेही जिवंत नरकवासामध्ये लोळू लागतो ! परंतु बुद्धाची ही अशी वृत्ती पाहून त्या ब्राह्मणास मोठा अचंबा वाटला. इतक्या शेलक्या शिव्या दिल्या, इतकी निर्भर्त्सना केली, तरी हा बुवा काही खवळत नाही, ह्याची चित्तवृत्ती क्षुब्ध होत नाही, ह्याची शांती आहे ती आहेच. हे पाहून तोच उलट अधिक क्षुब्ध झाला व म्हणाला, मी इतक्या शिव्यांची लाखोली वाहिली, इतकी निर्भर्त्सना केली, तरी त्याचा आपल्यावर काही परिणाम नाही. आपली पूर्वीची शांती आहे ती आहेच, हे कसे ? बुद्धदेव म्हणाले, “आपल्या होत्या नव्हत्या त्या सर्व शिव्या, सर्व शाप संपले ना ? नसल्यास आणखी चालू द्या. माझे उत्तर अगदी साधे आहे. पहा, कोणी मोठ्या प्रेमाने जर आपल्याला काही भेट आणली, पण त्या भेटीचा जर आपल्याला स्वीकार करावयाचा नसला, तर ते भेटीचे ताट आपण परत करतो, त्याचप्रमाणे मीही करीत आहे. आपली ही मला भेट आहे, हे ताट माझ्यापुढे ठेविले आहे पण ते मला नको आहे, मी त्याचा स्वीकार करीत नाही. आपण ते आणले आहे तसे आपले परत न्या. ते आपले आपल्याजवळच ठेवा !” कोण हा निश्चय, कोण ही शांती ! एकार्थी अशा प्रकारच्या साधू पुरुषाची निर्भर्त्सना करणे हे देखील मोठे पुण्य आहे ! कारण अशा साधूचा प्रत्यक्ष सहवास झाला म्हणजे मग आपली आतील पापे सगळी धुवून निघून आम्ही शुद्ध होतो !

हा असा निश्चय किंवा ही अशी निर्धाराची वृत्ती एकट्या गौतमबुद्धांचीच होती असे नव्हे. त्यांच्या शिष्यांनाही असेच साधन केले होते. एकदा एक शिष्य धर्मप्रचारास जाण्याची परवानगी मागू लागला. त्याची गौतमांनी अनेक प्रकारे समजूत केली, त्याचा निश्चय पाहिला. हा मार्ग नवीन आहे, लोक निर्भर्त्सना करतील, शिव्या देतील असे समजून मी समाधान मानून कामास लागेन असे बुद्धांनी सांगताच मला त्यांनी मारले नाही असे शिष्याचे उत्तर आले ! ‘पण तुला मारही बसण्याचा संभव आहे’ असे गुरूंनी म्हणताच, त्यांनी मला जिवे मारले नाही असे पाहून मी पुन्हा प्रचाराच्या कार्याला लागेन, असे शिष्याने सांगितले. ‘अरे बाबा, हा मार्ग इतका बिकट आहे, लोकांना इतका नावडता आहे की, ते खवळून जाऊन तुझा प्राणही घेतील’ असे बुद्धदेव म्हणाले. “तर मग ह्यापेक्षा आणखी काय पाहिजे ? लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत असता, लोकांच्या सेवेमध्ये असताना मला मरण आले तर ती माझी थोर पुण्याई, तर आता मला आपण मागे ठेवू नका, मला जाऊ द्याच. आपल्या कार्याला लागू द्या”. अशा शिष्याला मागे कोण ठेवणार त्याला नको जाऊ म्हटल्याने तो काय मागे रहाणार !

सारांश अशा प्रकारच्या निश्चयाने ह्या महामंत्राचा आम्ही स्वीकार केला, तर आमच्या अखिल पापांचा तत्काल नाश होईल. आमच्या सहवासाने इतरांच्या, ठिकाणी जागृती होईल. तर त्याचा स्वीकार करिताना आपण गरीब आहो, आपण स्त्री आहोत, आपण हीन जात म्हणून गणलेल्यांपैकी आहो, आपण अज्ञान आहो, आपण आधीच पापराशी आहो, असले विचारच मनात आणावयास नको. एकदा ह्या मंत्राचा स्वीकार करून निश्चयाने आम्ही वावरू लागलो की त्याचे कार्य दिसते, सर्व भेद नष्ट होतात, सर्व दोष नष्ट होतात, आपण शुद्ध होतो, आपण इतरांस शुद्ध करतो, आपण तरतो, इतरांस तारतो, असा हा नाममंत्र आहे, असा त्याचा महिमा तुकोबांनी आपल्याला सांगितला आहे तो आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करू या.

धर्मसाधन

(रविवार ता. ५-३-११ रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)

ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजाच्या सभासदांच्या मनांमध्ये वेळोवेळी असा प्रश्न उद्भवणे साहजिक आहे की आपण समाजाचे सभासद होऊन इतके दिवस झाले त्यात आपले धर्मसाधन किती झाले? समाजात सभासद होऊन इतके दिवस झाले त्यात आपले धर्मसाधन किती झाले? समाजात येण्यापूर्वीच्या आणि आल्यानंतरच्या स्थितीत फरक काय पडला आहे? प्रार्थना आणि उपदेश ह्यांच्याद्वारे आपणापुढे जे उच्च ध्येय ठेवले जाते त्यांपैकी कोणता भाग आपल्या चरित्रामध्ये संपादित झाला आहे? परंतु होत असलेल्या प्रयत्नाचे मानाने पहाता वरील प्रश्नास नेहमीच आशाजनक उत्तर मिळत असेल असे वाटत नाही. जगाच्या इतिहासात आजवर निरनिराळे जे धर्मसंप्रदाय होऊन गेले त्या सर्वांचा उद्देश व्यक्तीचे आणि समुदायाचे धर्मसाधन व्हावे हाच होता. प्रार्थनासमाजादी जे संप्रदाय आधुनिक काळात मोठ्या कसोशीने प्रस्थापित करण्यात आले आहेत त्यांचाही उद्देश हाच आहे. एकामागून एक इतके संप्रदाय काढण्यात आले आहेत त्यांचाही उद्देश हाच आहे. एकामागून एक इतके संप्रदाय काढण्यात येऊन आणि त्या त्या काळात त्यांची इतक्या आस्थेने जोपासना करूनही ज्याअर्थी धर्मसाधनाविषयी वरील धरसोडीचे उत्तर मिळते त्याअर्थी धर्मसंप्रदाय आणि धर्मसाधन ह्या दोन परस्परसंबंध विषयांवर पृथक् पृथक् थोडासा विचार करणे आवश्यक आहे.

नित्याच्या आपल्या बोलण्याच्या व्यवहारामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे पुरूषार्थाचे चार प्रकार येतात. पैकी विचार करिता मोक्ष, निर्वाण, पूर्णावस्था किंवा “Salvation” ही गोष्ट अनंतकाळची आहे, ही काही केव्हातरी एकदा मिळून जाण्यासारखी नाही म्हणून तिचा पुरूषार्थात समावेश करता येत नाही. दुसरे जे अर्थ आणि काम हे पुरूषार्थ आहेत ते इतके समर्याद आहेत की तुम्ही आम्ही साधारण माणसे देखील प्रसंगवशात त्यांची क्षुल्लकता जाणू शकतो. येणेप्रमाणे दोन अगदी समर्याद आणि एक अगदीच अमर्याद अशा प्रकारे तिन्हीची विल्हेवाट लागून चवथा राहणारा जो धर्म त्याजविषयी आज विचार कर्तव्य आहे. कित्येकांचे मते धर्म म्हणजे नुसती नीती असा अर्थ होतो. परंतु नीती म्हणजे हा एक आमचा दुस-याशी संबंध आहे. आपण जगात एकटेच असता किंवा आपल्यास दुस-या एका दूर निर्जन प्रदेशी सोडून दिले असता नीतीचा बहुतेक भाग संपुष्टात येऊन नीती अशी काही राहतच नाही. आत्मनीतीची तत्त्वे म्हणून जी काही आहेत ती तर खाण्यापिण्याच्या नेमस्तपणाप्रमाणे वरवरचेच नियम असतात. एकूण आपण एकटेच असताना नीतीचा विशेष प्रश्न रहात नाही. कारागृहात पडलेल्या दुर्दैवी माणसाची अशी स्थिती होते. परंतु आपल्या मनात उद्भवणारी सुखदु:खे, यत्न, विश्रांती, विवेक आणि समाधी, श्रद्धा आणि आशा इत्यादी थोर, गंभीर आणि पवित्र भावनांचे जे साम्राज्य चालू असते त्याला अशा एकांतवासाची आणि कारागृहाची काही बाधा होत नाही. त्याचे कार्य जसेच्या तसेच चालते किंबहुना अधिक बळावतेही. त्या भावना म्हणजे धर्म होय. त्यांचे पोषण करणे, उत्तरोत्तर संशोधन आणि वृद्धी करणे हे धर्मसाधन होय.

व्यक्तीचे अर्थ आणि काम हे दुसरे पुरूषार्त साधण्यामध्ये आणि समाजात राहून नीतीची निरनिराळी कर्तव्ये करण्यामुळे ह्या धर्मसाधनाचे काम कोणत्याही प्रकारे खोळंबता कामा नये. नाहीतर असा प्रकार व्हावयाचा :

देवधर्म सांदी पडिला सकळ | विषयी गोंधळ गाजतसे ||

धर्म म्हणजे नीती, असे ज्याप्रमाणे काहीकांचे मत पडते त्याचप्रमाणे वरील धर्मसाधनही अर्थ आणि काम ही साधीत असताना आणि समाजाचे निरनिराळे व्यवहार करीत असतानाच घडते, त्याला धर्माच्या नावाने निराळेच असे काही करावयास नको असे कित्येक सूज्ञ माणसांचे म्हणणे पडते आणि त्यांचा तसा अनुभवही असतो. ह्या म्हणण्यात जरी पुष्कळ तथ्यांश आहे तरी ते सर्वांशी खरे नाही. मनुष्यजातीचा किंबहुना सर्व जड सृषअटीचा जो सतत विकास होत चालला हे त्याचाच एक भाग आमचे हे धर्मसाधन आहे. ते आम्ही बुद्ध्या केले नाही तरी तो स्वभावत:च घडणारा एक परिणाम आहे. असा केव्हा केव्हा शहाण्या माणसाचा समज होतो, परंतु वर सांगितलेल्या पवित्र भावना अशा रीतीने केवळ अंधपरंपरेने किंवा आपोआप आम्हांस मिळालेल्या नसतात. त्यांचा पूर्वापार संबंध यद्यपि ह्याच क्षणी आपणांस आठवत नसला तरी केवळ इतर पुरूषार्थामध्ये त्याची कशी तरी भेसळ करून देऊन तो निराळा असा मुळी नाहीच असे म्हणण्याचे धाडस आम्हांस तरी होत नाही.

उलटपक्षी आमचे जे निरनिराळे जुने, नवे धर्मसंप्रदाय चालू आहेत त्यांच्या योगे आमचे धर्मसाधन घडते असे समजून कित्येक लोक स्वस्थ राहतात. धर्मसंप्रदाय काढणे हा एक धर्मसाधन करण्याचा मुख्य मार्ग आहे, ह्यात शंका नाही आणि ह्याचा विचार आपण पुढील खेपेस करू. परंतु आज आपल्यास जी गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की, केव्हा केव्हा ह्या धर्मसंप्रदायामुळेच धर्मसाधनास अडथळा येतो. मागे एका उपासकानी वाचून दाखविलेल्या उता-यांत सांगितल्याप्रमाणे धर्माचे प्रचारक आणि पुरोहित हे ज्या प्रेम, पश्चात्ताप, आत्मपरीक्षण इत्यादी धर्मभावनांचे नित्य प्रवचन करीत असतात त्यासंबंधी संवयीमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची जडता येते, कोरडेपणा येतो आणि ते त्यांपासून इतरांहूनही जास्त पराङमुख होण्याचा संभव आहे. आजपर्यंत एकामागून एक असे नवीन संप्रदाय काढण्याची जरूरी लागली आणि अजूनही पुढे लागले. ह्यावरूनही संप्रदायावरच सर्वस्वी अवलंबून राहून चालणार नाही हे उघड दिसते. आम्ही ज्या काही सांप्रदायिक प्रार्थना आणि उपदेश करतो त्यांच्यायोगे इतरांस जागृती होऊनही स्वत: ती न होण्याच संभव असतो. शुद्ध काचेतून ज्याप्रमाणे प्रकाशाची किरणे पार जातात त्याचप्रमाणे ईश्वरी प्रकाशाची किरणे आमच्यातून पार निघून गेलेली स्वत: आम्हांसच कळत नाहीत असे होते!

ह्यावरून वर म्हटल्याप्रमाणे, जरी संसारातील अर्थ आणि काम हे दोन पुरूषार्थ साधीत असताना काही अंशाने धर्मसाधन होते तरी तेवढ्यावरून जसे भागत नाही तसेच जरी एकाद्या संप्रदायात शिरून पूर्णपणे तन्मय होऊन ब-याच अंशाने धर्मसाधन होण्यासारखे आहे तरी तेवढ्यानेही भागत नाही हे उघड होते. धर्मसाधन हे प्रत्येक व्यक्तीने चिंतन, मनन, आत्मसंयमन, आत्मपरीक्षण, परसेवा व सहनशीलता इत्यादीद्वारा स्वत:च्या अनुभवाने व प्रयत्नानेच केले पाहिजे. ह्याहून अन्य उपाय आहेत पण त्यांची खात्री सांगवत नाही.

धर्मसंघाची आवश्यकता

(जून ता. २३ सन १९०७ रोजीं प्रार्थनामंदिरांत झालेला उपदेश.)

एक एका सहाय करुं अवघे धरुं सुपंथ |
- तुकाराम

चालू साली आमच्या समाजातून दोन मोहरे गेले. ते प. लो. वा. सदाशिवराव केळकर आणि नुकतेच गेलेले वासुदेवराव नवरंगे हे होत. सत्यवक्तेपणा, स्पष्टवक्तेपणा, स्वार्थत्याग, उद्योग, साधेपणा, धार्मिक वृत्ती इत्यादि अनेक गुम ह्या दोघांच्याही अंगी होते, पण ते त्यांचे विशेष गुण नव्हते, पासरीभर मतांची आणि प्रतिज्ञांची किंमत ज्या कृतीच्या एका तोळ्याइतकीही भरत नाही अशी भरीव कृती आमच्यापैकी ज्या थोड्या पुरूषांनी अगदी मरेपर्यंत अनेक अडचणी आणि संकटे सोसून साधली आणि आपल्या करारीपणामुळे प्रार्थनासमाजाला हल्लीचे जे संघस्वरूप दिले त्यांच्यापैकी हे दोघे होते. तो कृतीचा करारीपणाच ह्यांचा विशेष गुण होय. म्हणून अशा प्रसंगी-

(१) मनुष्य जातीचे जे विस्तृत जीवन आहे त्यात अशा धर्मसंघाचे कोणते महत्त्व व कशी आवश्यकता आहे?
(२) अशा संघाचा पाया कोणत्या तत्त्वांवर घालावा?
(३) त्या पायावर संघाची वरील उभारणी कशी करावी?

ह्या तीन महत्त्वाच्या मुद्यांवर ह्या पवित्र पीठावरून निरनिराळ्या वेळी सविस्तर प्रवचन व्हावयाला पाहिजे आहे. ते हल्लीच्या काळाला व प्रस्तुत देशस्थितीला अनुसरूनच असले पाहिजे. केवळ तात्त्विकदृष्ट्या पाहता सामान्यत: अशा संघाची आवश्यकता नाही. कारण पुरातन काळापासून निरनिराळ्या वेळी सर्वत्र धर्मसंघ स्थापन होत आलेले आहेत व त्याचे अवशेष अद्यापि मागे उरले आहेत.

तथापि हल्ली आमच्या देशात कसा विपरीत प्रकार चालला आहे पहा. चांगले शिकलेले, काही पुढारीदेखील खासगी संभाषणात उघडपणे म्हणतात की, हल्ली चहूंकडे राष्ट्रांराष्ट्रांमध्ये किती झटापट चालली आहे, बलवान दुर्बळाला कसा खाली रगडीत आहे, अशा वेळी धर्माच्या आणि सामान्य बंधुत्वाच्य गोष्टी सांगत बसणे योग्य नव्हे. निदान आमच्यासारख्या मागासलेल्या देशाने तरी केवळ सात्विकपणा स्वीकारणे शहाणपणाचे होणार नाही. आम्ही आधी राजसी गुणच वाढवून इतरांनी बरोबरी केली पाहिजे. म्हणजे नंतर समानतेच्या गोष्टी सांगितल्यास काहीतरी शोभेलच. असे प्रतिपादणारे धर्माचा आणि सात्विकपणाचा काही भलताच अर्थ समजत असतात. त्यांच्या मते शौर्य, धैर्य, वीर्य इ. गुण म्हणजे जणू सात्विक नव्हतेच. सात्विकपणा म्हणजे नुसते नेहमी सहन करून असणे असा केवळ निषेधार्थी अर्थ समजला जातो. पण वस्तुत: पाहता सत्त्व म्हणजे तर शुद्ध शक्ती असा आहे. विशेषेकरून वरील विचार करणारे जेव्हा जपानचे सुप्रसिद्ध व सर्वमान्य उदाहरण पुढे आणून आपले राजसी मत जोराने प्रतिपादतात तेव्हा तर धार्मिक प्रयत्न करणा-यांचे तोंड अगदी बंदच होते की काय अशी भीती पडते. जपानचे लोकांनी जी ही अकल्पित सरशी केली त्याचेपूर्वी त्याने कधी व कोणता धर्मसंघ स्थापला होता? उलट हिंदुस्थानाने आज गेली पाऊणशे वर्षे ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज इ. कित्येक संघ रचून काय दिवे लावले आहेत? जपानच काय पण हल्लीचे बहुतेक सर्वच पुढे आलेले देश धर्मबाबतीत अगदी उदासीन आणि जडवादी होत चालले नाहीत काय? मग आम्हीच हा कोरडा काथ्याकूट का करावा इ. अनेक आक्षेप वरील मंडळीचे निघतात. धर्मसंघ म्हणजे मतांची कोरडी काथ्याकूट करणारी मंडळीच एवढा अर्थ असेल तर वरील युक्तिवाद्यांशी निदान ब्राह्म आणि प्रार्थनासमाजिकांची बरीच सहानुभूती जमेल पण संघाचा अर्थ अगदी उलट आहे. म्हणून वरील प्रश्नात उत्तरादाखल उलट थोडक्यात एवढा प्रश्न केल्यास पुरे आहे. तो हा की, जपानात आणि इतर पुढे सरसावलेल्या देशांत धर्मबाबतीत लोकांना जे झपाट्याने स्वातंत्र्य मिळत चालले आहे. आणि त्यामुळे व्यक्तीचे व राष्ट्राचे शील वाढत चालले आहे, त्याचे खरे कारण तेथील धर्मविषयक औदासीन्य की धर्मविषयक विचार? आणि उलट पक्षी आमच्या देशात धर्माच्या नावाने आचारविचाराचे जे पुरातन पारतंत्र्य साम्राज्य चालू आहे आणि त्यामुळे शीलाची हानी होते तिचे खरे कारण आमची धर्मप्रवृत्ती की धर्मविषयक औदासीन्य बरे! ह्या दृष्टीने पहाता जपानात जरी ब्राह्म प्रार्थनासमाजाप्रमाणे धर्मसंघ स्थापण्यात आले नसतील तरी ब्राह्म प्रार्थनासमाजाचे कार्य जे उदार आत्मिक प्रवृत्तीचा देशात प्रसार करण्याचे ते जपानात खास होत असले पाहिजे. त्याशिवाय सर्व जगात थक्क करून सोडणारे इतके राष्ट्रीय तेज व नैतिक बळ एकाएकी उत्पन्न होणे शक्य नाही. हे नि:संशयच आहे. तसेच पण हेही नि:संशय आहे की हा जो जपानातील आत्मिक व नैतिक बळाचा झरा आपल्या भोवती साचलेले जड आच्छादन फोडून वर वर पाहणा-यास जणू अकस्मात आणि यदृच्छेनेच बाहेर आला आहे असे वाटले त्या झ-यावर जर वेळीच चोहोकडून योग्य बांध पडले नाहीत आणि त्याचे प्रगतीवर धर्मसंघ बनले नाहीत, तर हा वर आलेला पूर केव्हाच ओसरून जाईल आणि पुन: जपान जे आज जगाच्या आनंदाला व आश्चर्याला पात्र झाले आहे ते पुढे अनुकंपेला पात्र होईल. इतकेच नव्हे तर हल्ली कित्येक खोल दृष्टीचे प्रवासी जपानच्या उथळपणाविषयी प्रसंगवशात इषारा देत आहेतच. एकंदरीत पुढारलेले चिमुकले जपान काय किंवा मागासलेले अवाढव्य हिंदुस्थान काय दोहोंपक्षी धर्मसंघाची सारखीच आवश्यकता आहे. अवर्षण पडले असता खोल विहिरी खणून पाणी काढणे किंवा अतिवृष्टीमुळे पूर आला असता जागजागी बांध घालून पामी साठवणे ह्या दोन्ही गोष्टी जशा शहाण्या बागवानाच्या दृष्टीने सारख्याच महत्त्वाच्या व जरूरीच्या आहेत तद्वतच जपानातल्यासारखा साहजिक उद्रेक झाला काय किंवा हिन्दुस्थानातल्याप्रमाणे कितीही खडक फोडला तरी ठणठणीतपणाचा देखावा दिसला काय, सूज्ञ, दूरदर्शी व लोकिहतकारी जे ऋषी आहेत त्यांना धर्मसंघाची आवश्यकता दोन्ही प्रसंगी सारखीच भासेल. जगाच्या एका कोप-यात एकदा असा स्फोट झाला म्हणून सात्विक प्रयत्नाची कधीही व कोठेही जरूरी नव्हती, किंवा निदान हल्ली आमच्या देशात तर हमरीतुमरी आणि मारामारीसंबंधी नुसता बोलण्याचा सुकाळ केला की सर्व इतिकर्तव्यता झाली असे समजणे म्हणजे ह्या विपरीतपणाला सीमाच नाही म्हणावयाची.

ह्या जगात मनुष्य मनुष्यावर आजपर्यंत अनेक कारणांवरून अथवा सबबीवरून जी सत्ता चालवीत आला आहे ती चार प्रकारची आहे. (१) राजकीय, (२) धार्मिक, (३) सामाजिक, (४) औद्योगिक. ह्या चार सत्तांना अनुक्रमे (१) सरकार, (२) संघ, (अथवा अलीकडे समाज हे नाव अधिक प्रचारात येऊ लागले आहे.) (३) रूढी आणि (४) पत किंवा व्यवहार अशी नावे आहेत. ह्यांपैकी पहिल्या दोन म्हणजे राजकीय आणि धार्मिक सत्तांची पुरातन कालापासून सर्व देशांत सुव्यवस्थित रीतीने घटना होऊन चुकल्यामुळे ह्या दोन्ही चांगल्या नावारूपास आल्या आहेत. म्हणजे अधिकाराचे मूळ, अधिकारी पुरूष, अधिकारासंबंधी नियम व त्याची अंमलबजावणी ही सर्व ठरलेली आहेत. अधिकाराची स्थाने व पद्धती कदाचित देशकालाच्या मानाप्रमाणे बदलली तरी सर्व अधिकार नष्ट होऊन अजीबात सत्ताच बंद पडली असे होणे शक्य नाही. शेवटच्या दोन सत्ता, रूढी आणि व्यवहार ह्यांचे मात्र कार्य वरील दोन सत्तांच्याप्रमाणे व्यवस्थेने चालत नाही. कारण नियम, अधिकार आणि त्यांची स्थाने ही ठरणे शक्य नसल्यामुळे ह्या दोन सत्तांचे असे दृश्यरूप दिसून येत नाही. तथापि त्या निराकारपणे अस्तित्वात आहेतच.

वर सांगितल्याप्रमाणे मानवी समाजात (१) सरकार, (२) संघ, (३) रूढी, (४) पत अशा चार प्रकारच्या सत्ता चालू आहेत. ह्यांपैकी पहिल्या दोन साकार रूपाने व दुस-या दोन निराकार रूपाने चालू आहेत. म्हणून पहिल्या दोन्हीसंबंधी ज्या जुन्या संस्था बनून चुकल्या आहेत त्यांच्यात कालमानाप्रमाणे डागडुजी किंवा तोडजोड करणे अथवा नवीन संस्थांची भर घालणे हे त्यांच्या चालकांना शक्य आहे. असे करणे त्या त्या नेमलेल्या अधिका-यांचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी बजावले नाही किंवा बजावण्यात कसूर केली तर त्यांच्याकडून ते कर्तव्य करविण्याचा उपजत हक्क सर्व जनतेस आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, हल्ली आमच्या देशात जो तो राजकीय सत्तेसंबंधी आपला हक्क शाबीत करीत सुटला आहे, पण धर्मसत्तेच्या बाबतीतही प्रत्येक व्यक्तीस तितकाच उपजत हक्क आहे आणि धर्माचे अधिकारीही कालमानाकडे दृष्टी देऊन आपली जबाबदारी पाळतात की नाहीत हे पाहण्याचे काम धर्मसंघाला घटक ह्या नात्याने प्रत्यक व्यक्तीचे असून तिकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. मिळण्यासारखे असो किंवा नसो आम्ही राजकीय स्वराज्य मागू लागलो आहो. पण धार्मिक स्वराज्य आमचे आम्हांला आहेच. तिकडे लक्ष देतो कोण? आमचे धर्मगुरू मोठ्या मोठ्या संस्थानाचे मालक बनून बसले आहेत. वर्षात दोन चारदा हत्ती, घोडे, उंट इ. बड्य लव्याजम्यानिशी ते भिक्षेला निघतात त्यावेळी आम्ही त्याजपाशी स्वराज्य मागतो काय? मागे दिलेल्या कराचा हिशोब मागतो काय? सालोसाल राष्ट्रीय सभेमध्ये जशी आम्हांला पाहिजे त्या सुधारणांची एक यादी करून राजाकडे पाठवितो तशी धर्मबाबतीतही ठराव पास करून धर्मगुरूकडे पाठवितो काय? राजकीय बाबतीत अंतिम सत्ता लोकांची आहे, राजा केवळ त्यांनी नेमलेला अधिकारी आहे हे तत्त्व आम्ही राजाला शिकवू लागलो आहो तसे धर्मगुरूलाही तेच तत्त्व लागू करतो काय? आमच्या देशात किती तरी देवळांना सोन्याचे दरवाजे व रूप्याचे खांब आहेत आणि मूर्तीवर किती जडजवाहीर आहे, किती मौल्यवान देणग्या व मातबर वतने चालू आहेत आणि एकंदरीत धर्माच्या नावाने किती अवाढव्य खर्च बेदाद चालला आहे, आमच्या तत्त्वज्ञानावर किती शतकांचा गंज चढलेला आहे, आमच्या धार्मिक वाड्मयावर किती भलत्याच आगंतुक विचारांची कोळिष्टके आणि जळमटे वाढली आहेत, धर्माच्या नावाने शेखी मिरविणारे आम्ही सर्व जगाचे धर्मबाबतीत स्वत:स गुरू समजणारे स्वत: आमच्याच देशात धर्मशिक्षण कसे अजीबात बंद पडत चालले आहे, ह्या आणि अशा अनेक धर्मसंघाच्या बाबतीतील आमच्या हलगर्जीपणाकडे आमचे लक्ष जाते काय? पाश्चात्यांचे इतिहास व पाश्चात्यांच्या चळवळी पाहून राजकीय हक्क मागण्याचे कामी मात्र आम्ही त्यांचे अनुकरण करतो. पण धर्मसंघाचे बाबतीत पाश्चात्यांनी आपल्या देशात व जगभर जे भगीरथ प्रयत्न चालविले आहेतत्याचे अनुकरण तर राहोच पण नुसते अवलोकन तरी करतो काय? पाश्चात्य लोक राजकीय कर देताना आपल्या राजाशी प्रत्येक पेनीबद्दलही भांडण्यास मागे घेत नाहीत तेच आपल्या डोईजड धर्मगुरूच्या जुलमी सत्तेस आळा घालून आधुनिक समजुतीस शोभेल असे नवीन धर्मपंथ कसे काढीत आहेत व आपल्या ह्या नवीन धर्माचा, आपल्या जिवंत नीतीचा, आपल्या शीलाचा प्रसार आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या ओसाड आणि जंगली देशांतही करण्याकडे कसा लक्षावधी रूपयांचा दरसाल खर्च करीत आहेत; लहान मुलांकरिता आदित्यवारच्या धर्मशिक्षणाच्या शाळा, गरीब बायका आणि विधवांकरिता उपयुक्त घरगुती कला शिकविण्याच्या संस्था, काम न मिळाल्यामुळे लफंगे आणि बदमाश बनलेल्या तरूणांना ताळ्यावर आणण्याकरिता सायंकाळची क्रीडाभुवने अथाथ व उनाड मुलांना एकत्र करून त्यांना शेतकी, सुतारी व विणण्याचे वगैरे धंदे शिकवून व उत्तर अमेरिकेसारख्या देशात पाठवून तेथे वसविलेल्या वसाहती, नवीन शिक्षणामुळे तरूणांनी भडकून जाऊ नये म्हणून अगदी आधुनिक वाड्मयातूनच उदार आणि आध्यात्मिक विचार त्यांचे मनात बिंबविण्याकरिता व्याख्यानमाला आणि सर्वसाधारण लोकांकरिता सर्व ललितकलांचा विकास ज्या ठिकाणी पहावयास मिळेल अशी भव्य व मोहक उपासना मंदिरे, अशा कितीतरी गोष्टीत पाश्चात्य धर्मसंघाचे लक्ष्य गुंतलेले आहे, ते आमच्या तिकडे गेलेल्या प्रवाशाच्या नजरेत भरते तरी काय ? हे होत नसून जर आम्ही नुसते राजकीय स्वराज्यच मागत असलो तर मिळत नसलेल्या वस्तूबद्दल हट्ट व मिळालेल्या वस्तूबद्दल हेळसांड करणे हा केवळ आम्ही पोरकटपणा करतो असे वाटून कोणीही आमच्या मागण्यांचा आदर करणार नाही.

आपल्यातील कित्येक जुन्याचे अभिमानी विद्वान आपल्यास नेहमी असे भासवीत आहेत की, सुधारलेल्या देशात ख्रिस्ती धर्माची मते अगदी ढासळत आहेत आणि तेणेकरून तिकडील धर्मसंघाचे वजन बहुजनसमाजावरून पार उडत चालले आहे. आधुनिक ज्ञानाचा प्रकाश चोहीकडे फैलावत असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचीच काय पण जेथे जेथे हा प्रकाश पोहोचला आहे तेथील सर्वांची बनावट मते आणि भाकडकथा लयास जाऊ लागल्या आहेत. पण पाश्चात्य देशांतील आणि त्यातल्या त्यात आंग्लो-सॅक्शन लोकांचा विशेष हा की, त्यांच्यामध्ये संघशक्ती, प्रसंगावधान, व्यवहारचातुर्य आणि संसाराविषयी आदर इ. गुण उत्कृष्ट रीतीने वसत असल्यामुळे, त्यांनी सोकावलेल्या धर्माधिका-यांचे उद्दाम चोचले चालू न देता व ख्रिस्तानंतर तीनचार शतकांनी बनविलेल्या ३९ मतांची पर्वा फारशी न बाळगता, खुद्द ख्रिस्ताच्या सांगण्यात जो काही शाश्वत नीतीचा आणि आध्यात्मिक हिताचा मुख्य भाग होता, त्यावरच आपली सर्व मदार ठेवून आणि ख्रिस्ती धर्माचे मुख्य आणि विशेष असे जे तत्त्व स्वर्गीय राज्य पृथ्वीवर आणण्याचे ते बळकट ध्यानात ठेवून सर्व देशोदेशी, शहरोशहरी, गल्लोगल्लीतून स्वतंत्रपणे, धर्माधिका-यांच्या शिव्याशापास न जुमानता आणि प्रत्यक्ष राजाचाही प्राणांत छळ सोसून नवीन नवीन धर्मसंघाची संस्थापना केली. आधी रोमच्या शिरजोर मठाधिका-यास रजा दिली. पुढे जेव्हा चर्च ऑफ इंग्लंड म्हणजे इंग्रजांचा राष्ट्रीय अथवा सरकारी धर्मसंघ इंग्लंडच्या राजाने बळकावला व नुसत्या विधिसंस्काराचेच अवडंबर माजून ख-या व स्वतंत्र धर्मसाधनांत व्यत्यय येऊ लागला, तेव्हा ह्या मजबूत हाडांच्या लोकांनी आपल्या आवडत्या राष्ट्रीय संघालाही रामराम ठोकला आणि नॉनकनफॉर्मिस्ट म्हणजे विभक्त समाज स्थापिले, तेथेही जेव्हा प्रेसबिटर्स म्हणजे अधिकारारूढ वडील माणसांनी धुमाकूळ माजविला, तेव्हा ह्यांनी काँग्निगेशनेलिस्ट लोकसत्तात्मक समाज स्थापिले. त्यातही मताचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेना म्हणून युनिटेरिअन अथवा एकेश्वरी समाज निघाला. त्यातही जेव्हा जेव्हा मताविषयी किंचित दुराग्रह दिसतो तेव्हा प्रसिद्ध माहितीप्रमाणे फ्री ख्रिश्चन्स म्हणजे केवळ स्वतंत्र ख्रिस्तानुयायी म्हणविणारे निघतात आणि शेवटी रेव्ह. चार्लस व्हायसे हे तर आपल्यास नुसते ईश्वराचा अनुयायी म्हणवून एक निराला केवळ थिईस्टिक चर्च म्हणजे ब्राह्मसमाज चालवीत आहेत. असो. ह्याप्रमाणे कॅथोलिकापासून ब्राह्मसमाजापर्यंत परंपरा येऊन पोहोचली तरी नव्य जुन्या संघांतून जे कार्य होत आहे ते वर सांगितल्याप्रमाणे लोकशिक्षणाचे, लोकसंग्रहाचे, संसारिक फायद्याचे आणि तद्वारा आत्मिक संतोषाचेच होत आहे. केवळ तर्कवितर्क, कर्मठपणा किंवा जातीजातींनी परस्परावर आपली श्रेष्ठता शाबीत करण्याचे ओंगळ प्रकार फार कमी होतात. प्रख्यात मुक्तिफौजेच्या संघाची नुसती मते जर पाहू गेले तर ती जुनी आणि टाकाऊ दिसतील. त्यांतील काही भाविक सेवेक-यांच्या विश्वासाची मजल केव्हा इतकी पोहोचते की, उद्या सकाळी खात्रीने योहानाच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे येशू आपले स्वर्गीय राजदंड घेऊन खाली उतरणार असे मानून बिचारी झोपी जातात. ह्या विश्वासाची किंमत काही असो, मुक्तिफौजेचा संघ जे लोकसेवेचे कार्य दरोबस्त पृथ्वीवर रात्रंदिवस करीत आहे, त्याचा मासला आम्हांला तुकारामाच्या नुसत्या शब्दांत मात्र आढळतो.

जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ||
ज्यासि आपंगिता नाही | त्यासि धरी जो हृदयी ||

असो, ह्याप्रमाणे पाश्चात्य देशांतील जुने नवे धर्मसंघ कार्य करीत आहेत म्हणून त्यांचे लोकांवरचे वजन मुळीच कमी न होता उलट वाढत आहे आणि ह्याचा पुरावा इतकाच बस्स आहे की ह्या संघांना लोकांकडून पैशाची व अंगमेहनतीची जितकी विपुल व जशी खुशीने मदत मिळत आहे, तशी बोअर युद्धात ब्रिटिश सरकारला पैसे देऊ करूनही मिळाली नाही! तात्पर्य इतेकच की, धर्मसंघच इतर सर्व संघांना पोसणारा आहे. राष्ट्राचे भावी मुत्सद्दी, भावी वीर, भावी कवी, आणि इतर महात्मे ह्यांच्या शीलाचा विकास बाळपणी धर्मसंघातच होतो. ज्या देशात धर्मसंघ मृतप्राय झालेले आहेत किंवा जे शिल्लक उरलेले आहेत, त्याची सर्व करामत भोळ्या भाबड्यांची माया परोपरी जळवाप्रमाणे शोषून घेण्यातच खर्चत आहे, त्या देशात वीर पुरूष निर्माण होत नाहीत आणि झाले तरी राष्ट्रामद्ये मुळी शीलाचीच वाण असल्यामुळे, त्यांना जोमाचा अनुयायीगण मिळत नाही. त्यांच्या ईर्षा आणि मनोरथ जागच्या जागी निवतात व त्यांची वाढ खुंटते. शेवटी ते उरी फुटून अकाली लय पावतात आणि त्यांच्या हातून जे मोडके तोडके कार्य झाले असेल, त्याचे योग्य स्मारक करण्याचाही जोम पुढच्या पिढीत राहत नाही. बंधूंनो, ह्यासाठी धर्मसंघाची अगदी आवश्यकता आहे.

धर्मजागृती

[*सातारा येथील मित्रसंमेलनाकरिता रा.रा.वि.रा. शिंदे हे तेथे गेले असता समेलनासंबंधी त्यांचे “सामाजिक सुधारणा आणि हिंदी राष्ट्रीयत्व” ह्या विषयावर एक व्याख्यान झाले. त्याचा बराचसा सारांश तेथील प्रकाश पत्रात आला आहे. रा. शिंदे ह्यांची गावात आणखी काही धर्मासंबंधी   व्याख्याने व्हावयाची होती. पण नुकतीच व्याख्याने फार झाली असल्यामुळे तूर्त तो बेत तहकूब करावा लागला. तथापि तेथील छावणीतील लष्करी लोकांकरिता सदरबाजारात ता. २५ मे १९०५ रोजी संध्याकाळी वरील विषयावर रा. शिंदे ह्यांचे व्याख्यान झाले. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या व्याख्यानाकरिता मंडळी जमविणे, खुर्च्या, बाके, दिवाबत्ती वगैरेंची व्यवस्था राखण्याचे सर्व श्रेय एका मुसलमान पेन्शनर सदगृहस्थाने व त्याच्या काही सजातीय मित्रांनीच संपादिले. दुसरी गोष्ट ही की व्याख्यानाला जागा नेमिली होती ती बाजारातील एका मुख्य चव्हाट्याच्या कोप-यावरील पोलीसचौकीत पोलीसच्या अगदी खुशीनेच मिळाली होती व बाहेर रस्त्यापर्यंत बाके मांडली होती. चौकीचे खांब वेलीफुलांनी सुशोभित केले होते. मराठा लाईट इन्फंट्रीतील डॉक्टर, सुभेदार, जमादार वगैरे अमलदार शिपाई, मुसलमान, पार्शि व इतर लोक ऐकण्यास आले होते.]

धर्मावर भाषण करण्याचे मला जरी वारंवार प्रसंग येतात. तरी बहुतेक ते सावलीत, सुखाने बसून विद्याव्यासंग करणा-या पांढरपेशांमध्येच असतात. आज मला देशसंरक्षणाचे पवित्र पण कठीण ब्रीद बाळगणा-या तुम्हा क्षत्रियांपुढे बोलावयाचे आहे म्हणून आनंद होत आहे. धर्माची जागृती म्हणजे काय व ती कशी ठेवावी हे सांगण्यापूर्वी मुळी धर्म म्हणजेच काय हे सांगणे अवश्य आहे. कित्येकांचे म्हणणे असते की, धर्मतत्त्वे ही समजण्यास अत्यंत गूढ, वेद वगैरे जुन्या ग्रंथासही त्यांचा पार लागला नाही, व अलीकडच्या शहाण्या लोकांनी ह्याबाबतीत ज्ञान होणे अशक्य आहे, असा शेरा दिला आहे, म्हणून ह्या भानगडीत मुळी पडूच नये हे बरे. उलटपक्षी यात्रा, पूजा, नवस केले, कित्येक पिढ्या चालत आलेले बरेवाईट कुळाचार निमूटपणे चालविले आणि भटभिक्षुक आणि नातलग व शेजारी ह्यांची समजूत केली की झाला सर्व धर्म. ह्यात जर का कोठे कसूर झाली तर इहलोकी आपण नास्तिक ठरू, वाळीत पडू व परलोकी नरक भोगू अशी भीती पुष्कळांस पडते. पण थोडा विचार केल्यास वरील दोन्ही प्रकार असमंजसपणाचे आहेत असे दिसून येईल. धर्माचे व्यवहारापुरते ज्ञान कोणासही होमे केवळ अशक्य आहे असे नाही आणि त्याचे खरे आचरण ठेवणेही वरप्रमाणे केवळ वरपंगी नाही. तर आपण धर्म म्हणजे काय हे अगदी सोप्या दृष्टीने पाहू या. पतिव्रतेचा धर्म काय, पतीची आज्ञा पाळणे व सुख साधणे, विस्तवाचा धर्म काय, जाळणे. काचेचा धर्म काय, तर पलीकडचे दिसणे. ही मजपुढे दिव्यावर जी काच बसविली आहे, तिच्यातून जर दिवा दिसला नाही, स्वत: काचच दिसू लागली, तर ती काच नव्हे. आपण त्याला दगड म्हणून हात लावल्याबरोबर थंडगार लागू लागला तर त्यास विस्तव न म्हणता बर्फ म्हणू. म्हणजे काय की, काचेने व विस्तवाने आपापला धर्म म्हणजे अंगचा अवश्य गुण सोडला असे होय. ह्याप्रमाणे व्यवहारात ‘धर्म’ शब्दाचा आम्ही अर्थ समजतो. हाच अर्थ आम्ही नेहमी ध्यानात धरला तर धर्माचा व्यर्थ वाढलेला कठीणपणा कमी होईल. इतर पदार्थांत व प्राण्यांत जसे त्यांच्या अंगचे अवश्य गुण आहेत, तसेच मनुष्यप्राण्यांतही जो गुण आहे त्यास आम्ही धर्म म्हणतो, तो गुण हा की, मनुष्य आदिकरून निरनिराळ्या ठिकाणी जे धर्म आढळतात, त्या सर्वांचा उगम जो ईश्वर त्याचे ज्ञान करून घेमे, त्यासच शरण जाणे व त्याने लावून दिलेली सेवा सांभाळणे, हा गुण इतर प्राण्यांत आढळत नाही आणि जर कदाचित काही माणसांतही हा गुण आढळला नाही तर त्याची वाढ अद्यापि मनुष्यदशेपर्यंत झाली नाही असे समजून त्यास खुशाल खालील प्राण्यांत गणण्यास काही हरकत नाही. म्हटले आहे :

आहार-निद्रा-भय-मैथुनानि |
समानमेतानि पशुभिर्नराणाम् ||
ज्ञानं ही तेषामधिको विशेषः |
ज्ञानेनहीनाः पशुभिः समानाः ||

ह्या ठिकाणी ज्ञान म्हणजे वर सांगितलेला गुणच होय, केवळ खाण्यापिण्याचे ज्ञान नव्हे. ह्याचेच नाव धर्म.

हा धर्म म्हणजे अर्थात एकच असणार. त्याची अनेक रूपे जरी जगात अनेक कारणांनी आढळत असली तरी त्या सर्वांचे मूळ स्वरूप वर सांगितलेले एकच असणार. ही सर्व रूपे ईश्वरास सारखीच प्रिय असली पाहिजेत. आम्ही मात्र त्याचे मूळ स्वरूप विसरू नये. ईश्वराचे राज्यात हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती असा खात्रीने भेद होणार नाही.

हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा भेद पाळण्यात येत नाही, तर ईश्वराचे राज्य जे खात्रीने अधिक पवित्र असणार त्यात कसा पाळण्यात येईल! इंग्रजसरकार स्वत: ख्रिस्तीधर्माचे आहे. आपल्या धर्माची किंमत ते जाणत नाहीत असे नाही. पण आजपर्यंतच्या अनुभवाने ते जर, केवळ धर्म निराळा म्हणूनच एकाद्यास आपल्या दरबारात निराळी जागा न देण्याइतके शहाणे झाले आहे, तर देव काय त्यापेक्षा कमी शहाणा असेल की त्याच्या दरबारात असा भेद होईल! मग स्वत: देवच जर धर्मभेद पाळीत नाही तर मनुष्याने तो पाळणे किती सत्यास धरून होईल बरे? हे सत्य व धर्माचे मूळ स्वरूप लक्षात सतत बाळगणे म्हणजे धर्मजागृती, अथवा धर्म जागा राखणे असे होईल.

पण अलीकडे धर्मजागृती करणे याचा भलताच अर्थ होऊन बसला आहे. हिंदूने म्हणावे की, आमचाच धर्म सर्वात जुना, श्रेष्ठ आणि पवित्र म्हणून त्याचे जे हल्ली आचार आहेत त्यांचाच वरचष्मा राखू, मुसलमानांनी ह्याच्या उलट प्रयत्न करावे, व ख्रिस्त्यांनी तर ह्या दोघांनाही पुढे नरकवासच आहे असे भाकीत करावे, असा प्रकार चालला आहे. असे होता होता परधर्माची खूप निंदा करणे, त्यातील असतील नसतील ते सर्व दोष बाहेर काढणे व प्रसंगी दंगा माजविणे हेच धर्मजागृतीचे लक्षण झाले आहे. अशाने आम्ही कधी देवाकडे जाऊ? आम्ही येथे ह्या पोलिसचौकीत आहो ते जर समजुतीच्या चार गोष्टी बोलून एकमेकांचे हृदगत जाणू तर ठीक. पण जर का दंडेली करून एकमेकांतला नीच भाव वाढवू लागू, तर तत्काल हे पोलीसदादा आम्हा सर्वांस बाहेर घालवितील. असे आहे तर जन्मभर धर्माच्या नावाने वाद माजवून व तंटे वाढवून शेवटी ईश्वराकडे गेलो तर तो कसा आम्हांस आत घेईल बरे?

ब्राह्मसमाज अगर प्रार्थनासमाज जी धर्मजागृती करीत आहे ती अशाप्रकारची नव्हे, किंवा हल्ली चालू असलेल्या सर्वच धर्मपंथांत थोडे बहुत दोष आहेत म्हणून तेवढे दोषच दाखविण्याचेही काम समाज करीत नाही. तर सर्व पंथांत भरून असलेले मूळ स्वरूप उघडकीस आणून हल्ली सर्वांचा समेट करण्याचा व अखेरीस काच, अग्नी इत्यादिकांस वर सांगितल्याप्रमाणे जसा एकच धर्म, तसा मानवी अंत:करणाचीही ईश्वराकडे ओढ घेणे हा एकच धर्म आहे, असे सिद्ध करण्याचा समाजाचा प्रयत्न आहे. ह्या सातारा गावीही रा.रा.काळे, जव्हेरे वगैरे मंडळी हाच प्रयत्न करीत आहेत. धर्म जागा ठेवणे असल्यास तुम्ही सर्वांनीही त्यास मदत करणे जरूर आहे.

धर्म समाज आणि परिषद

* धर्म, समाज आणि परिषद
(* लाहोर येथील ब्राह्मपरिषदेंतील मुख्य उपासना ता. २६ डिसेंबर १९०९ रविवारीं सायंकाळीं ब्राह्म मंदिरांत झाली ती कलकत्त्याचे भाई ब्रजगोपाळ नियोगी ह्यांनीं हिंदींत चालविली व त्यानंतर रा. वि. रा. शिंदे ह्यांनीं इंग्रजींत उपदेश केला त्याचा सारांश.)

काही काळापूर्वी धर्म आणि शास्त्र ह्यांमध्ये लढा पडला होता व आता ह्या दोहोंमध्ये समेट झाला आहे असे हल्ली मानण्यात येत आहे. पण ह्या समजुतीत एक प्रकारचा धोका आहे. कारण एक तर हा वरील लढा पडण्याचे पूर्वी धर्माचेच एकछत्री राज्य होते, त्याला आता शास्त्ररूपी जबरदस्त प्रतिस्पर्धी भेटल्यामुळे त्याच्याशी तडजोड करावी लागली आहे, ह्यामुळे धर्माचा एक प्रकारचा पराजयच झाल्याचा भास होत आहे. शिवाय शास्त्र अद्यापि होतकरू आहे व धर्माचे तर दिवस होऊन चुकले आहेत. म्हणून पूर्वीचे पारडे अगदी बदलून पुढे शास्त्राचेच एकछत्री राज्य होईल असा ध्वनी ह्या तडजोडीच्य वादातून निघत आहे. म्हणून समेटाच्या ह्या वरच्यावर गोष्टी सोडून देऊन आपल्याला धर्म आणि शास्त्र ह्यांचे प्रांत कसे भिन्न आहेत ते पाहिले पाहिजे. शास्त्राचा कोणताही प्रांत घ्या तो देश काळाच्या मर्यादांनी आखून टाकिला आहे. प्रकाश घ्या, त्याच्याभोवती अनंत अंध:काराचे अवगुंठन आहे. प्राण घ्या, तो अनंत मृत्यूच्या कोंदणात बसविलेला आहे. यावद्भवमात्र अनंत अभावाने व्याप्त दिसत आहेत. अज्ञानेनावृतं ज्ञातं तेन मुहयंति जंतव:| ह्या पदात वर्णिलेले आकुंचित ज्ञानच शास्त्राचे साधन जी बुद्धी तिचा विषय आहे. तिची शक्ती कितीही ताणली तरी अनंत अमर्याद वस्तूपर्यंत तिची मजल कदापि पोहोचणे शक्य नाही, तेथून तिला अप्राप्य मनसासह परत यावे लागणार. पण मनाची दुसरी जी अपूर्व शक्ती श्रद्धा तिचा मात्र ही अनंत अमर्याद वस्तू होऊ शकते. ह्या दृष्टीने पाहाता धर्माचा प्रांत शास्त्राच्या हल्ल्यापासून त्रिकाळ सुरक्षित आहे हे कळून येईल. धर्माचा हेतू आणि कामगिरी म्हणजे ह्या श्रद्धाशक्तीची नेहमी जोपासना करून तिचा उत्तरोत्तर शुद्ध विकास करणे हा होय. अर्थात ब्राह्मधर्माची तर ह्याहून दुसरी काही कामगिरी नाही.

आता धर्मसंघाची अथवा समाजाची कामगिरी काय ते पाहू. श्रद्धेचा विकास करणे हा जो धर्म ह्या पुरूषार्थाचा हेतू त्याला अनुसरून आजपर्यंत होऊन गेलेल्या किती धर्मसंघांनी किंवा समाजांनी आपली कामगिरी बजावली आहे बरे? शिंप्याच्या दुकानात ज्याप्रमाणे आयते तयार केलेले कपडे विक्रीला ठेवतात त्याप्रमाणे ह्या समाजात आयती मते व आयते आचार ह्यांचा माफक दराने सारखा क्रयविक्रय चाललेला असतो! ब्राह्मधर्माची ज्योत जागती ठेवावयाची असेल तर ब्राह्मसमाजाला हा नुसता दलालीचा धंदा करून चालावयाचे नाही. धर्मसमाजाचे काम आपल्या सभासदांपैकी प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वतंत्र आणि स्वाधीन बनविणे हे आहे. त्याला कसल्याही धर्ममताखाली चिरडून टाकणे किंवा कर्मात कोंडून ठेवणे हे नव्हे. मते आणि आचार ही ख-या श्रद्धेला बहुधा मारक होतात, विरळाच प्रेरक होतात. ह्यावरून समाजाने व्यक्तिसाठी काहीच न करता त्यांना नुसते वा-यावर मोकळे सोडले म्हणजे त्या स्वतंत्र व स्वाधीन होतात सा अर्थ नव्हे. उलट समाजाची सभासदांसंबंधी मोठी जबाबदारी आहे. सभासदाची समाजासंबंधी जबाबदारी म्हणजे वर्गणी, अंगमेहनत आणि आगमन ह्यांत बहुतेक येते. पण समाजात जो अधिकृत वर्ग असतो त्याने सभासदांपुढे नित्य निरनिराळी मते प्रतिपादिली पाहिजेत, नवे नवे सिद्धांत शोधले पाहिजेत, सुंदर विधी आणि संस्कारांची शोभा दाखविली पाहिजे. पण ह्यांतील एकाचाही तिळमात्र आग्रह न केला पाहिजे. ठराविक मतांचा आणि विधींचा एकच साचा-मग ती कसलीही असोत, सभासदांच्या गळ्यात अडकविल्याने समाजाची इतिकर्तव्यता झाली असे निदान ब्राह्मसमाजाने तरी समजून चालावयाचे नाही. भिन्न भिन्न मते आणि प्रचार सभासदांपुढे अशा कुशल रीतीने ठेविले पाहिजेत की, त्यांची योग्य निवड करण्यास त्यांना मदत मिळेल. डॉ. किंग नावाचे अमेरिकन उपदेशक हिंदुस्थानात नुकतेच असे सांगून गेले की, मुलांना वर्तनाची योग्य निवड करता येईल अशी पूर्ण मदत करमे एवढेच काय ते पालकांचे कर्तव्य होय. इतर व्यवहारात अज्ञान मुलाशी पालकांचा जो संबंध आहे तोच धर्मबाबतीत संघांचा साधारण सभासदांशी आहे. ह्यावरून श्रद्धेचा विकास करणे हा धर्माचा उद्देश आहे, असे समजावे. म्हणजे ब्राह्मसमाजाचे मुख्य लक्षण स्वातंत्र्य किंवा व्यक्तित्व हेच होय. त्याशिवाय श्रद्धेची वाढ होत नाही, इतकेच नव्हे तर उलट लयच होतो असे इतिहास पुकारीत आहे.

आता परिषदेची कामगिरी काय आहे ती पाहू या. व्यक्तीला आपले व्यक्तित्व राखता येत नाही. ते वाढविण्याची तर गोष्ट राहो, ह्यासाठी संघाची जरूरी आहे, ही गोष्ट सकृतदर्शनी चमत्कारिक दिसते, पण खरा प्रकार असाच आहे. संघ जर आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावील तरच व्यक्तीचा विकास सुरळीतपणे होईल. पण जशी व्यक्तीला संघाची जरूरी तशीच संघाला परिषदेची आहे. एकाद्य ठिकाणचा समाज कितीही मोठा व चांगला असला तरी त्यालाही व्यक्तीप्रमाणे मर्यादा व उपाधी आहेतच व त्यामुळे त्याच्या कर्तव्यशक्तीला आळा पडतो व धर्माच्या अनंत उन्नतीला बाधा येते. म्हणून ठिकठिकाणचे समाज निदान आपल्या प्रतिनिधींच्या द्वारा नियमित काळी एकत्र व्हावेत हे जरूर आहे व स्वाभाविकही आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माच्या इतिहासात वेळोवेली परिषदा भरल्या आहेत. पण आमच्या ठिकठिकाणच्या ब्राह्म व प्रार्थना समाजांमध्ये ही भावना अद्यापि व्हावी तशी मुळीच रूढ झाली नाही. *

असो. धर्म, समाज आणि परिषद ह्यांचे उद्देश अनुक्रमे श्रद्धा, स्वातंत्र्य आणि सहकार्य वाढविणे हे होते.

  1. धर्म आणि व्यवहार
  2. देशभक्ति आणि देवभक्ति
  3. देवाचा व आपला संबंध
  4. दान आणि ऋण
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
Page 106 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी