१९२० सालातील निवडणूक

लॉर्ड साऊथबरो यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात आलेल्या फ्रँच्याइज कमिटीने आपला अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला सादर केला. सदर अहवालाच्या संदर्भात आपले मत, प्रतिक्रिया आणि शिफारशी हिंदुस्थान सरकारने भारमंत्र्यांना कळविल्या व अखेरीस पार्लमेंटने मतदारसंघाची निश्चिती करून राखीव तसेच सर्वसाधारण मतदारसंघ जाहीर केले. जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार मराठा व तस्तम जाती असा एक गट करण्यात आला व त्यांच्यासाठी मुंबई इलाख्यात सात जागा राखून ठेवण्यात आल्या. मराठा व तत्सम जाती या नव्या वर्गीकरणात मराठा, कुणबी, माळी, कोळी, भंडारी, शिंपी, लोहार, कुंभार, धनगर, भोई इत्यादी जातींचा स्पष्ट नामनिर्देश करून समावेश होईल असे स्पष्ट केले. ह्या नव्या योडनेनुसार नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होतील असेही सरकारने जाहीर केले.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी निवडणुकीत जातीय तत्त्व आणण्याच्या कल्पनेला १९१७ पासूनच जाहीरपणे विरोध केलेला होता. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या राष्ट्रीय मराठा संघाने आयोजित केलेल्या शनिवारवाड्यापुढील १६ डिसेंबर १९१७च्या सभेत सर्व जातींच्या प्रतिनिधींनी एकमुखाने राष्ट्रसभेच्या लखनौ येथे ठरलेल्या धोरणाला पाठिंबा दिला होता व राजकीय सुधारणेबाबत अथवा होमरूलबाबत आपली एकोप्याची भूमिका प्रकट केली होती. शिंदे यांच्या या भूमिकेला पुण्यातील मातब्बर मराठा नेत्यांचा पाठिंबा होता. त्यामध्ये त्र्यंबक हरी आवटे, काशिनाथ ठकुजी जाधव, नारायण गुंजाळ, बॅ. व्ही. एम्. पवार हे प्रमुख होते व राष्ट्रीय मराठा संघाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते. तारीख १० व ११ नोव्हेंबर १९१७ रोजी बेळगाव येथे व-हाडातील बॅ. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतवासी मराठा परिषद भरली. विठ्ठल रामजी शिंदे यांचाही या परिषदेला पाठिंबा होता. ह्या परिषदेमध्ये मराठा जातीसाठी स्वतंत्र अथवा राखीव जागा असू नयेत असेच मत प्रकट केले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचीच भूमिका बडोदा येथील जागृतीचे संपादक भगवंतराव पाळेकर हे मांडीत होते.


मात्र मराठा जातीसाठी लीगने मराठा राष्ट्रीय संघाच्या विरुद्ध भूमिका मांडावयास सुरुवात केली. शाहू छत्रपतींनी १९१७ सालच्या अखेरीस खामगाव येथे भरलेल्या अकराव्या मराठा शिक्षण परिषदेत बोलताना निदान दहा वर्षे आम्हाला जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार असला पाहिजे अशी जाही मागणी केली. ब्रिटनमधील संसद सदस्यांना जातवार प्रतिनिधित्वाच्या मागणीपाठीमागची भूमिका पटवून देण्यासाठी मराठा लीगच्या वतीने श्री. भास्करराव जाधव १९१९च्या जुलैमध्ये इंग्लंडला गेले होते. प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये गेल्यावर भास्करराव जाधवांच्या भूमिकेत पालट झाला. तरी त्यांनी संयुक्त संसदीय समितीसमोर साक्ष देताना मुंबई इलाख्यातील कायदेमंडळावर एकंदर शेकडा तीस जागा मराठा वगैरे मागासवर्गाच्या प्रतिनिधींसाठी राखून ठेवाव्यात असे प्रतिपादन केले. ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी व डेक्कन रयत असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिनिधी वा. रा. कोठारी यांनीही जातवार प्रतिनिधित्वाची भूमिका आपल्या निवेदनातून मांडली होती. साऊतबरो कमिटीच्या अहवालातही मराठ्यांना जातवार प्रतिनिधित्व का असावे याबद्दलची कारणमीमांसा नमूद केली आहे. “अस्पृश्यवर्गाशिवाय ज्यांना जातवार प्रतिनिधित्व देण्याचा विचार करावा असा वर्ग म्हणजे मराठ्यांचा समाज. मराठ्यांच्या बाजूने असे म्हणणे शक्य आहे की शिखांबाबत स्वतंत्र जागा देण्यासंबंधी जो युक्तिवाद केला जातो तो मराठ्यांनाही लागू आहे. म्हणजे अनेक जिल्ह्यांत एकंदर लोकसंख्येत त्यांची बहुसंख्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर ब्राह्मणी वर्चस्व इतके दांडगे आहे की जेथे त्यांची बहुसंख्या आहे तेथेसुद्धा ते स्वजातीचा प्रतिनिधी निवडून आणू शकत नाहीत. मात्र एकंदर लोकसंख्या आणि महत्त्व यांचा विचार करता त्यांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. हे प्रतिनिधित्व त्यांच्यासाठी जातवार मतदारसंघ निर्माण करून अथवा सर्वसाधारण मतदारसंघात जातवार जागा राखून देता येऊ शके.” कमिटीने हेही नमूद केले आहे की मराठा समाजाच्या आकांक्षा जर सफळ झाल्या नाहीत तर गंभीर स्वरूपाचा असंतोष निर्माण होण्याची भीती आहे. ह्या भूमिकेला विरोधी असणारे दुसरे मत म्हणून मुसलमानांप्रमाणे मराठ्यांचा विचार करता येत नाही असेही नमूद केले आहे. मराठ्यांना जातवार जागा देण्यात प्रमुख अडचण म्हणजे मराठा या संज्ञेची व्याप्ती निश्चत करणे कठीण असल्याचे तिसरे मतही कमिटीने नमूद केले आहे.१


मराठा जातीच्या प्रतिनिधित्वासंबंधी एवढे उलटसुलट विचारमंथन झाल्यावर अखेरच्या निर्णयात मात्र सरकारने मराठा व तत्सम जातींसाठी सात जागा राखून ठेवल्या.
नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होणार हे जाहीर झाल्यानंतर पुण्यातील मराठा समाजाच्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा उत्साह दाखविला व निवडणुकीच्या संदर्भात जेधे मॅन्शनमध्ये एक सभा बोलावली. ह्या सभेस विठ्ठल रामजी शिंदे यांना आग्रहपूर्वक बोलावणे केले होते. आगामी निवडणुकीमध्ये शिंदे यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे असे दोन्ही पक्षांच्या मंडळींनी आग्रहपूर्वक सांगितले. शिंदे यांनी याप्रसंगी मी राखीव जागेसाठी उभा राहणार नाही. त्यातील जातिवाचक तत्त्वाच्या मी विरुद्ध आहे असे ठामपणे सांगितले. मात्र पुणे शहराच्या सर्वसाधारण जागेसाठी सर्व पक्षांनी मिळून मदत करावयाची ठरवल्यास आपण निवडणुकीस उभे राहण्यास तयार आहोत, असे सांगितले.


१९२० पर्यंत सक्रिय राजकारणातून सदैव दूर राहणा-या विठ्ठल रामजी शिंद्यांनी कायदेमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावयाचे जे ठरविले, त्यापाठीमागे काहीएक कारमे संभवतात. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यापासून हिंदुस्थानातील राजकारणाचे चित्र बदलले होते. वेगवेगळ्या स्तरावरील जातीच्या लोकसमाजामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण होऊ लागल्याचे स्पष्टपणाने दिसून येऊ लागले. याचे अनेक बरेवाईट परिणाम सामाजिक जीवनातही दिसून येऊ लागले.


अस्पृश्य मानलेल्या वर्गालाही ह्या नव्या राजकीय घटनेचा लाभ व्हावा, असे शिंदे यांना वाटत होते. सभा-परिषदा घेऊन त्यांच्यामध्ये सर्वांगीण जागृती करण्याचे कामही शिंदे यांनी चालविले होते. बदललेल्या वातावरणात अस्पृश्यवर्गामध्ये काही एका प्रमाणात राजकीय जागृती झाल्याची चिन्हे दिसत होती. मात्र त्याचबरोबर आपल्या लोकांसाठी शिंदे यांनी स्थापन केलेली संस्था आपण आपल्या ताब्यात घ्यावी व शिदे यांचे नेतृत्व सर्वस्वी झुगारू द्यावे, अशा प्रकारचा प्रयत्न अस्पृश्यवर्गातील काही मंडळींकडून सुरू झाल्याचे शिंदे यांना जाणवू लागलेले होते. अस्पृश्यवर्गीय पुढा-यांचा विरोध वाढतच जाणार अशी चिन्हे त्यांना दिसू लागली तेव्हा आतापर्यंत आपण अस्पृश्यवर्गाची उन्नती हेच जे कार्यक्षेत्र मानले होते व संघटित स्वरूपात आपण त्यांच्यासाठी संस्थात्मक पातळीवरून जे काम केले ते तसेच चालू ठेवण्यास स्वारस्य नाही. लवकरच ही संस्था त्या मंडळींच्या ताब्यात द्यावी. असे शिंदे यांनी मनोमन ठरविले असणार. अस्पृश्यवर्गाची सेवा ही तर त्यांची जीवननिष्ठा बनून राहिली होती. यापुढे कायदेकौन्सिलात जाऊन ह्या वर्गाची सेवा करत आली तर पाहावे, असा विचार त्यांच्या मनात आला असणे शक्य आहे.


अस्पृश्यवर्गाच्या जोडीनेच समाजातील शेतकरी, स्त्रिया यांसारके वर्ग मागासलेले आहेत व त्यांचीही स्थिती सुधारणे आवश्यक आहे, असेही त्यांना वाटले असावे. बहुसंख्य असलेल्या मराठावर्गामध्ये राष्ट्रीय स्वरूपाच्या जाणिवा निर्माण करणेही त्यांना आवश्यक वाटले होते वत्या दृष्टीने त्यांनी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्याच्याबाबतीत पुढाकार घेतला होता. त्या निमित्ताने मराठा समाजातील कर्तबगार नेते त्यांच्याजवळ आले होते.


सक्रिय राजकारणात भाग घेऊन देशकार्य करावे असे त्यांच्या जर मनात आले, तर काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवावी असे त्यांना का वाटले नाही? बहुजन पक्ष असा स्वतंत्र जाहीरनामा काढून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यापाठीमागे विठ्ठल रामजी शिंदे यांची वैचारिक भूमिका असणार. स्वराज्या मिळविणे हा काँग्रेसचा निकडीचा प्रश्न होता. हे स्वराज् अथवा स्वातंत्र्य मिळविल्यावर देशाची भावी घटना कशी असावी ह्या प्रश्नामध्ये काँग्रेसने लक्ष घातले नव्हते. त्याबद्दल काँग्रेसला विशेष आस्था असल्याचेही जाणवत नव्हते. त्यांच्या ददृष्टीने काँग्रेसमधील जहाल व मवाळ हे ध्येयावरून नव्हे, तर पद्धतीवरून पडलेले भेद होते. तेव्हा स्वराज्य मिळाले तरी दलित, शेतकरी, स्त्रिया इत्यादी दुर्बल समाजघटकांची दाद काँग्रेसकडे सत्ता आली तरी लागेलच अशी शिंद्यांना खात्री नव्हती. म्हणून विद्या, सत्ता, संपत्ती यांनी आचवलेल्या व म्हणून दुर्बल राहिलेल्या बहुजन जमाजातील विविध गटांचा कैवार घेणारा बहुजन पक्ष या नावाने जाहीरनामा काढून आपली भूमिका विशद करून निवडणूक लडवावी असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले असावे. आपण राजकारणात का भाग घेत आहोत यासंदर्भात आपली भूमिका कोणती आहे हे प्रकट व्हावे यासाठी शिंदे यांनी ‘बहुजन पक्ष’ ह्या नावे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शिंदे यांचा जाहीरनामा पुढीलप्रमाणे होताः


बहुजन पक्ष
हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीयदृष्ट्या दोन मुख्य भाग पडत आहेत. ते हे की, (१) विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलाने पुढारलेला वर्गा आणि (२) दुसरा, यातील कोणतेच बल अंगी नसल्याने व नाइलाजाने मागासलेला वर्ग किंवा बहुजन समाज. ह्या दुस-या वर्गातच अत्यंत तिरस्कृत अशा अस्पृश्यवर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लीच्या राजकीय सुधारणेचा अरुणोदय होतो न होतो तोच या दोन भागांत मोठा विरोध भासू लागला आणि या विरोधानुसार बहुजन समाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाच एक नवीन पक्षच होऊन चुकला आहे. ह्यालाच ब्राह्मणेतर पक्ष असे नाव दिले जाते. पण नाइलाज आणि बलहीनता ही जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणे ती ह्या वर्गाच्या पक्षास ब्राह्मणेतर पक्ष असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाही. म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजन पक्ष असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाही. म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजन पक्ष अथवा जनपद पक्ष असे अगदी सार्थ व निर्विकल्प नाव दिल्याने त्यावर कसलाही आक्षेप आणण्यास जागा उरणार नाही.


कार्यपद्धती : हा नवीन पक्ष इतरांशी स्वतंत्रपणाने वागणारा आहे. तरी जेथे त्याच्या हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील तेथे तेथे समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यक्ती असो की पक्ष असो त्याला सक्रिय साहाय्य करण्यास तयार असेल त्याच्यासाठी तेवढ्यापुरते सहकार्य करायला हा पक्षही तयार राहील. कारण ह्या पक्षाच्या पायाखाली केवल पोकळ भावना नसून भरीव हितसंबंध आहेत. ह्या पक्षात खालील वर्ग मोडतात.


पहिला, शेतकरीवर्ग : ह्यात डोईजड जमीनदारांचा किंवा पिढीजात जहागीरदारांचा समावेश मुळीच होत नाही. जो आपल्या मालकीचे अथवा कौलाचे शेत आपणच वाहतो आणि त्या कामासाठी पुरेशा मजुरांना समान दर्जाने योग्य वेतन देऊन संभाळतो तोच शेतकरी जाणावा.


दुसरा, शिपाईवर्ग : ह्यात सरदारांची गणना मुळीच नाही. पण सामान्य शिपायाने हितसंबंध आमच्या पक्षाशीच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेलेच आहेत. कुणबी हा ह्या सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार व जहागींरदार हे केवळ त्याचे पोष्य होत. तसेच हाताव शिर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय, तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे.


तिसरा, शिक्षकवर्ग : ह्यात सोवळे शास्त्री, हक्कदार, पुरोहित किंवा बलुते जोशी हे किंवा इतर ऐतखाऊ यांची गणना करत येत नाही. वाङमयाचे किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत व जे आपल्या वृत्तीचा पिढाजात हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणे चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात धर्म काही असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षाने राखणे जरूर आहे.


चौथा, उदमी : सुतार, सोनार, शिंपी, तेली, तांबोळी, गवळी इत्यादी लहान लहान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित व अनधिकारी वर्ग आहेत तेही राष्ट्राचे धारक असून त्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई यांपेक्षा रतिभरही कमी नाही.


पाचवा, दुकानदार : ह्यात व्याज देऊन दुस-याचे भांडवल वळवून आणून त्यावर गबर होणारे पेढीवाले किंवा कंपनीवाले वर्ज्य आहेत. परंतु उदमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्याने जी राष्ट्रीय संपत्ती शेतक-याने निर्माण केली व शिपायांनी राखली तिची देशभर वाटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांची तितकीच जरुरी आहे. हा वर्ग डोईजड होऊन बहुजन समाजाचे रक्त बिनहक्क शोषणार नसेल तर ह्यालाही पुढे आणण्यासाठी आमच्या पक्षाने झटणे अवश्य आहे.


सहावा, मजूरवर्ग : ह्यात बाजारभावाप्रमाणे वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हेत तर बद्धिचातुर्य लढवणारे वकील, डॉक्टर यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करून अधिकारपदावरही सहजच जाऊन बसतो. इतकेच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजन समाजाचे पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वाट्याला येते. असे लोक तत्त्वतः मजून असले तरी वस्तुतः मागासलेले नसल्यामुळे त्यांच्या हितसंबंधांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे बरे. बाकी उरलेल्या ख-या अंगमेहनती मजुरांची दाद आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेच लागणे शक्य नाही. मजूरही डोईजड झाल्यास त्यांची समजूत करण्याचा अधिकार बहुजन पक्षालाच आहे.


सातवा, अस्पृश्यवर्ग : अस्पृश्यपणामुले हा वर्ग मागासलेलाच आहे; एवढेच नव्हे तर चिरडला गेला आहे. धर्माची, परंपरेची, रूढीची अगर दुसरी बहुजन समाजात एकजीव करणे हे ह्या पक्षाचे केवळ पवित्र कार्य आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादात, ढोंगी ठरावात व मतलबी सहानुभूतीत अगोदरच दवडली गेली असल्यामुळे ह्या वर्गातील व्यक्तींना साहजिकच भलतेच वळण लागू लागले, म्हणून आमच्या पक्षाने सावध राहिले पाहिजे.


आठवा, स्त्रीवर्ग : चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाच्या हाती काहीच लाभले नाही. आमचा पक्ष विद्वानांचा नाही; वक्त्यांचा नाही; ओरडणा-यांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असे थोडेच होणार आहे? स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल. हे आम्ही पूर्ण जाणून आहोत.


येथवर आम्ही केवळ वर्गवारीने हितसंवर्धनाचै निरीक्षण केले. पण ज्यांची वर्गवारी मुळीच करता येत नाही असे पुष्कळ हितसंबंध आहेत. सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधी व सामाजिक परंपरा पाळण्याच्या बाबतीत स्वयंनिर्णयाचा इत्यादी कोणताही पक्ष घ्या. हे सर्व राष्ट्रीय असूनही स्वतःस ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हा त्यांच्या आड येतो आणि ‘प्रागतिक’ म्हणवून घेणारा आपले हात टेकतो तेव्हा बहुजन समाजास जागे करून त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कठीण काम करण्यासाठी आमच्यासारख्या एखाद्या स्वतंत्र व नवीन पक्षाला पुढे येणे जरूर आहे. राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल त्याच्या हिताला आमचाही विरोध नसेल. ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साहाय्य तरी करतील अशी आम्हांला उमेद आहे.”२

विठ्ठल रामजी शिंदे
नानाची पेठ, भोकरवाडी, पुणे
१ सप्टेंबर १९२०


समाजामधील अस्पृश्यवर्ग, शेतकरीवर्ग, स्त्रीवर्ग तसेच इतर मागासलेले वर्ग ह्या सा-यांची उन्नती करण्याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात अतीव तळमळ होती. सामाजिक पातळीवरून विशेषतः अस्पृश्यवर्गाची सेवा करण्याचा आतापर्यंत तळमळीने प्रयत्न केला होता. प्रत्यक्ष राजकाणात प्रवेश करून व कायदेमंडळावर प्रतिनिधित्व करून ह्या सा-या मागासवर्गाची सेवा अधिक परिणामकारक रीतीने करता येईल काय हे शिदे यांना पाहावयाचे होते असे दिसते. अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्यासाठी आतापर्यंत केले त्यापेक्षाही अधिक प्रयत्न जारीने करणे आवश्यक आहे त्यांना वाटत होते. अस्पृश्यवर्गाबद्दल त्यांना वाटणारी आस्था तिळमात्र कमी झालेली नव्हती अशी वस्तुस्थिती असली तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मिशनबद्दल व खुद्द शिंदे यांच्याबद्दल केवळ तक्रारीचाच नव्हे तर टीकेचा सूर अस्पृश्यवर्गातून शिकलेल्या तरुणांकडून आणि काही पुढा-यांनकडून तीव्रपणे उमटू लागला होता. कदाचित या कारणांनीही असेल. अस्पृश्यवर्गाबद्दलची उन्नती करण्याची आपली भूमिका व प्रयत्न कायम ठेवून कायदेमंडळात जाऊन आपल्या कार्याचे क्षेत्र अधिक विस्तृत करावे व लोकप्रतिनिधी म्हणून अस्पृश्यांसकट अन्य मागासवर्गाची सेवा करावी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटावे असे शिंदे यांना वाटले असावे व म्हणूनच त्यांनी निवणुकीस उभे राहण्याची आपली तयारी दाखविली असावी.


निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रारंभिक अवस्थेत राष्टवादी मराठे तसेच सत्यशोधकी अथवा ब्राह्मणविरोधी मराठे ह्या दोन्ही पक्षांनी शिंदे यांच्या उमेदवारीस जोराच पाठिंबा दर्शविला खरा, परंतु हे चित्र शेवटपर्यंत तसेच टिकून राहिले नाही. ह्यामध्ये दिसून आलेली मतमतांतरे व भूमिकांमधील पालट चित्तव्धक म्हणावेत अशा प्रकारचे दिसून आले. पुण्याच्या ह्या जागेसाठी श्री. न. चिं. केळकर हे जहालांमार्फत, शेठ मानूरकर हे मवाळांमार्फत आणि वासुदेवराव गुप्ते व विठ्ठल रामजी शिंदे हे दोघे स्वतंत्र असे चार उमेदवार उभे होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले आहे की, “पैकी वासुदेवराव गुप्ते यांना कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांचा पूर्ण पाठिंबा होता. स्वतः महाराज आणि त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते.” शिंदे यांनी असे जरी नमूद केलेले असले तरी निवडणूकीच्या प्रारंभी श्रीमंत शाहू छत्रपतींनी विठ्ठल रामजी शिंदे यांना पाठिंबा प्रकट केला होता. शिंदे यांनी इलेक्शनला उभे राहण्याचे ठरवल्यानंतर शाहूमहाराजांना समाधान वाटले. ते त्यांनी पुढील पत्रातून प्रकट केले.


आपण आम्हा सर्वांचे विनंतीस मान देऊन इलेक्शनला उभे राहण्याचे कबूल केले याबद्दल आम्हास आपले उपकार वाटत आहेत. आपल्यासारखे योग्य पुरुष मराठा समाजाला काय तर कोणत्याही समाजाला लाभले तर फारच उत्तम आहे. इलेक्शनच्या कामी माझ्या हातून जी सेवा होईल ती मोठ्या आनंदाने करीन.

शाहू छत्रपति३


विठ्ठल रामजी शिंदे यांना मदत करण्यासाठी त्यांचे बडोद्याचे मित्र श्री. खासेराव जाधव पुण्यास दोन महिने येऊन राहिले होते व निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली भवानी पेठेत सभा भरली होती. या सभेमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी श्री. न. चिं. केळकर यांनी भाषण केले त्यात त्यांनी आपले वाडवडील शेतकरी होते. आपण मराठा पत्राचे संपादक आहोत म्हणून मराठेच आहोत असे सांगितले. ही बातमी ऐकल्यानंतर श्रीमंत शाहूमहाराजांनी स्वतःच्या सहीने विठ्ठल रामजी शिंदे यांना पत्र पाठविले ते असे:


रायबाग कँप
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस
सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही विनंती.
मला मनापासून आपले अभिनंदन करण्याची परवानगी द्या. आपण शहरातर्फे निवडून यावे अशी माझी आशा आहे. नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात की “मी मराठा आहे म्हणून मला निवडून द्यावे. कारण मी मराठा वर्तमानपत्र चालवितो.” त्याच्यावर मी म्हणतो की, माझ्या बैलाचे नाव ‘ब्रिटानिया’ ठेवले आहे, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव ‘टर्किश फ्लॅग’ ठेवले, माझ्या गायीचे नाव ‘जपानिका’ ठेवले म्हणून का मी जपानी अगर टर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल? वि. रा. शिंदे मराठेवर्गापैकी आहेत. जपानातील सामुराई वर्गाने (क्षत्रिय) आपले उच्च स्थान सोडून सर्व लोकांस आपल्या बरोबरीचे केले व देशोन्नती केली तसे शिंद्यांनी केले आहे. मी पुण्यास लवकर येणार आहे. भेटीअंती सर्व खुलासा होईल. परमेश्वर आपणास इलेक्ट करो.


ता. क. जहाल असो किंवा मवाळ असो, जपानी असो की टर्किश असो आमचे धोरण असेच की, ज्यात जनतेचे धोरण त्याशी आम्ही सहाय्य करणेचे व आमचा पक्ष स्वतंत्रच रहावयाचा. सत्य पक्षाशी नेहमी सहाय्य करण्याचे हेच ना आम्ही ध्येय ठेवण्याचे? ह्यात काय चुकत असल्यास लिहून कळवावे. आपण वृद्ध अनुभवशीर आहात म्हणून मी आपल्या उपदेशाची अपेक्षा करीत आहे.


ता. क. आम्ही कोणातच मिळू इच्छित नाही. सत्य असेल तेथे मिसळल्याशिवाय राहणार नाही. हेच ना आम्ही मुलांनी ध्येय ठेवायचे? लोभ करावा ही विनंती.
शाहू छत्रपति४


छत्रपती शाहूमहाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना प्रकट केली व निवडणुकीत त्यांना यश लाभावे याबद्दलही पत्रामधून शुभेच्या प्रकट केल्या, मात्र श्रीमंत शाहू छत्रपती शाहूमहाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना प्रकट केली व निवडणुकीत त्यांचा यश लाभावे याबद्दलही पत्रामधून शुभेच्या प्रकट केल्या, मात्र श्रीमंत शाहू छत्रपतींची ही भूमिका अखेरपर्यंत टिकून राहिली असे मात्र दिसत नाही. ह्या संदर्भात एक घटना नोंद घेण्याजोगी घडली असे दिसते. या निवडणूकीच्या धामधुमीच्या काळात श्री शिवाजी मराठा सोसायटीची एक सभा भवानी पेठेतील पालखीच्या विठोबाच्या धर्मशाळेत ३ ऑक्टोबर १९२० रोजी भरली होती. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरास क्षात्रजगदगुरूच्या निर्मितीची कल्पना उदित झाली होती. या बाबतीत मराठा समाजातले लोकमत आजमावून पाहावे असे शाहू छत्रपतींना वाटत होते. सभेच्या प्रारंभी श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विद्यार्थ्यांचे कसरतीचे व लाठीकाठीचे खेळ झाल्यावर संस्थेचे सेक्रेटरी श्री. बाबुराव जगताप यांनी संस्थेचा अहवाल वाचला. छत्रपतींनी जो मराठा क्षात्रजगदगुरू नेमण्याचा विचार चालवला होता ह्या संदर्भात तेथे जमलेल्या प्रमुख मंडळींनी आपले विचार मांडावेत असे आवाहन केले. ह्या बाबतीत रा. ब. वंडेकर यांचे भाषण झाले. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनीही आपली भूमिका मांडावी असे शाहू छत्रपतींनी सुचविल्यानंतर शिंदे म्हणाले, “धार्मिकबाबतीत काही वाद निघाल्यास त्यात अखेरचे मत अभिषिक्त राजाने द्यावे अशी परंपरा पहिल्या शाहूमहाराजापासून आहे, असे इतिहास सांगतो. आता छत्रपती शाहूमहाराजांनी दुस-या कोणास जगदगुरू न नेमता त्याचे सर्व अधिकार आपणच चालवावेत.” विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका ही त्यांच्या प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजाच्या भूमिकेशी सुसंगत अशीच होती. परमेश्वर आमि भक्त यांच्यामध्ये कोणीच मध्यस्थ असू नये ह्या भूमिकेचे हे मतप्रतिपादन स्वाभाविक पर्यवसान होते. मराठ्यांचे अभिमानी असणा-या मंडळींना अथवा तीव्र स्वरूपाचा ब्राह्मणविरेध असणा-या मंडळींना शिंदे यांची भूमिका पटणारी नव्हती. शिंदे यांच्यानंतर भास्करराव जाधव यांचे आवेशयुक्त भाषण झाले. जाधवांच्या भाषणातील एका विधानावर मुंबईचे श्री. रामचंद्र अर्जुन गोळे यांनी आक्षेप घेतला. त्यावर गोंधळ माजून सभेत प्रत्यक्ष मारामारीस सुरुवात झाली. अशा स्थितीतही खासेराव जाधवांनी श्री. शाहू छत्रपतींचे आभार मानून सभा विसर्जन केल्याचे जाहीर केले. ह्या मारामारीत श्री. बाबुराव जेझे व गं. मु. काळभोर यांना बराच मार बसला. जागृतीकार पाळेकरही ह्या सभेला उपस्थित होते, परंतु त्यांच्या डोक्यावर बडोद्याचे पागोटे असल्यामुळे ते परस्थ आहेत या समजुतीने मारामारीतून बचावले.”५


ह्या उधळल्या गेलेल्या सभेचा परिणाम शिंदे यांच्या निवडणुकीवर निश्चितपणे झाला. कारण ज्या सर्व पक्षांच्या मराठ्यांनी मिळून त्यांना निवडणुकीसाठी उभे केले होते त्यांच्यामध्येच फूट पडली. राष्ट्रवादी मराठ्यांच्या म्हणजेच शिंदे यांच्या विरोधात सत्यशोधकी विचाराची अथवा ब्राह्मणेतरवादी मराठा मंडळी गेली.


या सुमारास महात्मा गांधींनी कौन्सिलप्रवेशावर बहिष्कार टाकण्याची असहकाराची चळवळ जोरात सुरू केली. म्हणून न. चिं. केळकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली व शिंदे यांनाही निवडणुकीत अपयश आले. सत्यशोधकी विचाराच्या मराठ्यांप्रमाणे छत्रपती शाहूमहाराजांची शिंदे यांच्याबद्दलची भूमिका कदाचित ह्या सभेत प्रकट झालेल्या मतामुले बदलली असण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती शाहूमहाराजांचा पूर्ण पाठिंबा वासुदेवराव गुप्ते यांना होता व स्वतः महाराज व त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते असे शिंदे यांनी याबाबतीत नमूद केलेले आहे. एवढे खरे की, शाहू छत्रपतींचे ह्या निवडणुकीत साहाय्य मिळाले नाही. मात्र शिंदे यांचे मित्र खासेराव जाधव ह्यांनी या निवडणुकीनिमित्त दोन महिने आपला मुक्काम पुण्यामध्ये ठेवला. शिंदे यांना मते मिळावीत यासाठी घरोघर हिंडण्याचे परिश्रम घेतले व हजारो रुपयांचा खर्च केला. खासेराव जाधवांनी दाखविलेले प्रेम व केलेले कष्ट याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्याबद्दल अतिशय कृतज्ञता वाटली. पुण्यातील स्थानिक मंडळींपैकी ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे, गंगारामबुवा काळभोर, बाबुराव जेधे व केशवराव जेधे आणि शिंदे यांचे लष्करातील मित्र डॉ. मोदी यांनी जी निष्कामपणे ह्या निवडणुकीत शिंदे ह्यांना मदत केली त्याबद्दलही शिंदे यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली. ह्या निवणुकीत मराठा मंडळींमध्ये पडलेली फूट व मराठा समाजात निर्माण झालेला अंतर्गत पुढील काळात टिकून राहिला.


संदर्भ

१.    दि रिफॉर्म्स कमिटी, Vol.II कलम ६४०४-०६.
२.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३०६-३०८.
३.    तत्रैव, पृ. ३०९.
४.    तत्रैव.
५.    भगवंत पाळेकर, जागृतिकार पाळेकरः आत्मवृत्त आणि लेखसंग्रह, बडोद, पृ. ४२-४३.