1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

काठेवाडचा दौरा

विठ्ठलराव शिंदे जमखंडीवरून परत आल्यानंतर १९०४च्या एप्रिलमध्ये काठेवाडात दौरा करण्याचा योग जुळून आला. त्यांचे गुजराथेतील मित्र नानालाल कवी हे त्या सुमारास सादरा येथे सरकारी नोकरीत होते. त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत शिंदे यांच्याबरोबर काठेवाडीतील समाजाच्या प्रचारकार्यासाठी दौरा काढण्याचे ठरविले व शिंदे यांना तसे निमंत्रण दिले. स्टेशनवरून त्यांना सादरा गावापर्यंत उंटावर बसून जावे लागले. हा प्रवास काही सुखद नव्हता. साद-याहून प्रथम ते दोघे अहमदाबाद प्रार्थनासमाजात गेले. समाजाचे अध्यक्ष पंढरपूर येथील अनाथालयाचे संस्थापक लालशंकर उमियाशंकर यांची प्रथमच ओळख झाली. विठ्ठलराव शिंदे यांनी प्रार्थनासमाजात व्याख्याने दिली. सभासदांचा परिचय करून घेतला. प्रार्थनामंदिर प्रशस्त आणि सुंदर होते. नंतर अहमदाबादहून ते दोघे राजकोटला गेले व शंकर पांडुरंग पंडित यांच्याकडे उतरले. राजकोटातील राजकुमार कॉलेज व दुसरी एक श्रीमंत थाटाची शाळा त्यांनी पाहिली. राजकोटहून भावनगरला जाऊन शिंदे यांनी तेथील कॉलेजात व्याख्यान दिले. जुनागड येथे दिवाण बेचरदास यांच्याकडे ते उतरले. व्याख्याने, भेटी इत्यादी कार्यक्रमानंतर गिरनार पर्वतावर चार दिवस मुक्काम करण्याचे ठरविले. दिवाणांच्या ओळखीमुळे त्यांची तेथे राहण्याची उत्तम व्यवस्था झाली.

गिरनार पर्वत जवळ जवळ ४००० फूट उंच आहे. पायथ्याशी सम्राट अशोकाचा प्रसिद्ध शिलालेख आहे. गिरनारच्या पश्चिमेस गीर नावाचे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. प्राणिसंग्रहालयात त्यांनी दहा-बारा सिंह पाहिले. शिखरावर कित्येक प्राचीन, सुंदर जैनमंदिरे आहेत. तेथून आसमंतातला देखावा आत्म्याला जागृत करणारा आहे असे शिंदे यांना वाटले. ह्या पर्वतावर मोठमोठ्या खोल गुहा आहेत. नानालाल व शिंदे एका गुहेत प्रवेश करून बरेच लांबवर गेल्यावर त्यांना विलक्षण दृश्य दिसले. शिंदे यांनी त्याचे मोठे वेधक वर्णन केले आहे. “गाभा-यात कितीतरी निःसंग आणि विरक्त साधू राहत असलेले आम्ही पाहिले. पेटलेल्या धुनीचा प्रकाश अंधारात रौद्र रसाची प्रेरणा करीत होता. साधूंच्या मुद्रा गंभीर आणि प्रसन्न. शरीरे धष्टपुष्ट आणि तेजःपुंज. बहुतेक नग्न आणि राखेने माखलेली पाहून फार आश्चर्य वाटले. ह्या निर्जन प्रदेशात ह्या साधूंची खाण्यापिण्याची सोय कशी लागते, इतर योगक्षेम कसा चालतो याचे कोडे आम्हाला पडले. साधूंना असे प्रश्न विचारल्यावर त्यांनी नुसते हासून आमची बोळवण केली. गुहेच्या आसपास ठिकठिकाणी शुद्धोदकाची कित्येक टाकी दिसली. त्यांचा उपयोग हे साधू आणि जंगलातले व्याघ्रादी वन्य पशू यांच्याशिवाय दुसरे कोण करणार! हे आळीपाळीने टाक्यावर येऊन जात असत. त्यांच्या गाठीभेटी होऊन काय प्रकार घडत असे हे कळण्याला मार्ग नव्हता.”१

गिरनार पर्वतावरील वास्तव्याचे त्यांचे चार दिवस मोठ्या समाधानाचे, एकांतवासाचे आणि धर्मचिंतनाचे गेले. जुनागडला परत आल्यानंतर त्यांची मियागावचे ठाकूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी आपल्या जहागिरीच्या गावी येण्याचे शिंदे यांना मोठे अगत्यपूर्वक निमंत्रण दिले व शिंदे त्याप्रमाणे गेलेही. तेथे त्यांना एका जुन्या शाहिराची एकतारीवरची सुंदर भजने ऐकावयास मिळाली. त्यांपैकी तेजाभगत नावाच्या शाहिराची दोन-तीन पदे त्यांनी उतरून घेतली. पुढे कीर्तनात त्यांना त्यांचा चांगला उपयोग झाला. नानालाल कवींचा निरोप घेऊन शिंदे अहमदाबादहून मुंबईला परतले.

संदर्भ
१.    विठ्ठल राजमी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १६५.

काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव

१९१६ पासून हिंदुस्थानच्या राजकारणाचे वारे स्वराज्याच्या दिशेने जोरात वाहू लागले. डॉ. अँनी बेझंट यांनी होमरूल चळवळीला जोरदार प्रारंभ केला. इकडे महाराष्ट्रातही लो. टिळकांनी होमरूलची चळवळ उत्साहाने सुरू केली. ह्या चळवळीला समाजातील सगळ्या जातींचा व धर्मांचा पाठिंबा मिळणे आवश्यक होते. हा पाठिंबा मिळण्यासाठी विविध जातिधर्माच्या लोकांमध्ये असणारा भेदभाव नाहीसा होऊन त्याच्यात एकजूट निर्माण होण्याची आवश्यकता होती. स्वराज्याचे हे भलेमोठे ध्येय राजकीय पुढा-यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवल्याने समाजामध्ये असणा-या विविध भेदांना आपोआपच गौणत्व येऊ लागले होते. तसेच एकजूट निर्माण करण्याचे जाणीवपूर्व प्रयत्नही सुरू झाले होते. आम्ही आमचे राज्य करणार आहोत ही गोष्ट ब्रिटिश सरकारच्या गळी उतरवायची असेल तर ह्या स्वदेशी अमलाबाबत एकमत दिसून येणे आवश्यक होते. राजकीय चळवळीच्या ह्या रेट्याला लाभ अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यालाही होऊ शकला.


डिप्रेस्ड क्लासेस मिशनची १९०६साली स्थापना केल्यापासून हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी राष्ट्रसभेपुढे येणे आवश्यक आहे, असे विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटत होते. प्रत्येक राष्ट्रसभेच्या अधिवेशनच्या वेळेल्या होणा-या सामाजिक परिषदेच्या निमित्ताने तर ते उपस्थित राहत होतेच; शिवाय राष्ट्रसेभेच्या अधिवेशनाच्या जोडीनेच ते सेक्रेटरी ह्या नात्याने ब्राह्म धर्मपरिषद आयोजित करण्याची जबाबदारीही सांभाळीत होते. राष्ट्रसभेचेच पुढारी सामाजिक परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित असत व तेथे ह्या प्रश्नाचा ऊहापोह चालत असल्यामुळे डी. सी. मिशनच्या कार्याची व शिंदे यांच्या प्रयत्नांची राजकीय पुढा-यांना चांगली माहिती झाली होती. बिपिनचंद्र पाल लाला लजपतराय, पं. मदनमोहन मालवीय, लो. टिळक, डॉ. अँनी बेझंट हे नेते विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चांगल्या परिचयाचे झाले होते. १९१७च्या अखेरीस कलकत्ता येथे होणा-या राष्ट्रसभेच्या अधिवेशनच्या अध्यक्ष डॉ. अँनी बेझंट ह्या होत्या. डॉ. अँनी बेझंट यांना मिशनच्या कामाची जवळून महिती होती. मुंबई व पुणे येथे मिशनने चालविलेले काम त्यांनी स्वतः बघितले होते व अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल त्यांना स्वतःला तळमळही वाटत होती. १९०७ पासून जवळ जवळ आठ-नऊ वर्षे विठ्ठल रामजी शिंदे हे राष्ट्रसभेने अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मांडावा म्हणून दरवर्षी राष्ट्रसभेला मिशनच्या वतीने विनंती करीत आले होते. परंतु ह्या प्रश्नाकडे राष्ट्रसभेचे आतापर्यंत लक्ष गेले नव्हते. कलकत्त्याच्या अधिवेशनाच्या वेळचे चित्र मात्र बदलले होते. वर म्हटल्याप्रमाणे होमरूलची चळवळ भरात आली होती. ह्या चळवळीचे प्रवर्तन करणा-या डॉ. अँनी बेझंट ह्याच काँग्रेसच्या अध्यक्षही होत्या व सुदैवाने मिशनच्या कामाची त्यांना चांगली माहिती होती. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे शिंदे यांच्या आठ-नऊ वर्षांच्यातपश्चर्येला फळ आले. शिंदे यांच्या आग्रहावरून मिसेस बेझंटना राष्ट्रसभेच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव काँग्रेसच्या कार्यक्रमाता घेऊन मंजूर करता आला.१


राष्ट्रसभेचे ३२वे अधिवेशन अँनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली २६ डिसेंबर १९१७ रोजी कलकत्ता येथे सुरू झाले. अस्पृश्यतानिवारणासंबंधीचा ठराव पंधराव्या क्रमांकाचा होता व तो मद्रासकडील सुप्रसिद्ध पुढारी जी. ए. नटेशन ह्यांनी मांडला. ठराव असा होताः “ही राष्ट्रीय सभा हिंदुस्थानातील सर्व लोकांस अशी जाहीर विनंती करते की, अस्पृश्यवर्गावर आजपर्यंत जो अनन्वित जुलूम होत आहे व ज्यामुळे ह्या वर्गाला विविध प्रकारच्या छळाला व गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे, अशी अस्पृश्यतेची रूढी न्याय, चांगुलपणा ह्यांना अनुसरून ताबडतोब बंद करण्यात यावी.”


या ठरावावर भाषण करताना जी. ए. नटेशन म्हणाले, “आजर्यंत हा प्रश्न अन्य व्यासपीठावर मांडला गेला. राष्ट्रसभेची वैशिष्ट्यपूर्णता लक्षात घेऊन हा प्रश्न येथेही मांडण्याची आवश्यकता ध्यानात घेतली आहे. आम्ही स्वदेशाची योजना आखली आहे. आपण आपल्यावर राज्य करावे ही योजना पूर्ण करण्यासाठी ही बाब आवश्यक आहे. आपले पहिले कर्तव्य हे आहे की, सर्व प्रकारची विषमता आणि अन्याय दूर करणे. ह्या ठरावाचा मुख्य रोख ह्या वर्गावर लादलेली दुर्धर स्वरूपाची जी निकृष्टता आहे, ती दूर करण्यावर. आपण ब्रिटिश नागरिकत्वाचे सर्व हक्क एकीकडे मागत असताना आपल्याच लोकंपैकी काहींना साधे माणुसकीचे हक्क कसे बरे नाकारू शकतो? लोकांच्या धार्मिक भावना न दुखविता, आपल्या धार्मिक परंपरेत जे चांगले आहे ते न गमवता, काँग्रेसही विश्चितपणे ह्या वर्गावर जे चमत्कारिक निर्बंध घातले आहेत ते काढून टाकण्यासाठी सांगू शकते. ह्या देशाच्या काही भागांत ह्या लोकांना इतर गावक-यांबरोबर विहिरीतून पाणी काढण्याचासुद्धा अधिकार नाही. या प्रकारचा निर्बंध नाहीसा झाला पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, ह्याच सहा कोटी लोकांच्या समाजामधून नंद, चोखामेळा, रोहिदास यांसारखे संत उदयाला आले. अशा प्रकारचे सुप्त मला खात्री वाटते की हा ठराव तुम्ही मान्य करून त्याप्रमाणे निश्चितच त्याची अंमलबजावणी करायला लागाल. या लोकांची उन्नती करण्याच्या रूपाने खरे म्हणजे आपण हिंदुस्थानातल्या माणुसकीचीच उन्नती करीत आहोत आणि ज्या वेळेला आम्हाला जबाबदार स्वयंशासन प्राप्त होणार आहे. त्या वेळेला आपण निर्धाराने म्हणू शकू की, हे स्वयंशासन हिंदुस्थानातील सर्व वर्गांसाठी, सर्व जातींसाठी आहे व सर्वांना सारखेच सामाजिक अधिकार आहेत.”


ठरावाला अनुमोदन देताना बँ. भुलाभाई देसाई म्हणाले, “मी गुजराथेतील ब्राह्मण आहे व या ठरावाला पाठिंबा देण्यात मला अभिमान वाटतो. आपल्या बांधवांपैकी काहीजणांना आपण जी वागणूक देतो ती आपण बंधुत्वाची जी शिकवण देतो, तिच्या नेमकी विरुद्ध आहे. आपण आपल्या ह्या बांधवांची जर उन्नती करू शकत नसू तर आपण आज सकाळी होमरूलचा जो ठराव पास केला त्याबाबत ब्रिटिश लोकशाहीकडे मागणी करण्यास आपल्याला कोण अधिकार आहे? ते म्हणतील, तुमच्याच लोकांना सामाजिक अधःपातापासून वाचविणे तुमच्या हातात असताना तुम्ही ते का करीत नाही? ह्या वर्गाची उन्नती करणे केवळ आपल्या हातात आहे, त्यासाठी अन्य कोणा सत्तेकडे जाण्याची गरज नाही. म्हणून या प्रकारचा ठराव पुढे आणण्यात काँग्रेसने एक पाऊन पुढे टाकले आहे. लॉईड जॉर्जने काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या जनतेला असे सांगितले होते की, इंग्लंडातील मजूरवर्ग हे महायुद्ध जिंकू शकेल. मीही असेच म्हणतो की, आपण समाजिक न्यायाचा अवलंब केला तर आपल्याला अभिप्रेत असलेले स्वराज्य मिळवू शकू. आणखी वरच्या पातळीवर बोलावयाचे झाले तर मी असे म्हणेन की, श्रीकृष्णाने असे म्हटले नव्हते काय की, मी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाता वास करीत असलेला दिसेन. असे जर आहे तर सहा कोटी लोकांना सामान्य माणुसकीच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे बरे? ही घातुक चाल म्हणजे हिंदुत्वाचा अवमान आहे. म्हणून आवश्यकता, न्याय व त्यातप्रमाणे चांगुलपणा ह्यांना अनुसरून या ठरावामध्ये जी मागणी केली आहे तिला मान्यता देणे हे योग्य आहे आणि ते जर आपण मान्य केले नाही तर आपल्याला स्वराज्य मागायास तोंड आहे काय?”  बँ. भुलाभाई देसाईंच्या या भाषणाचे श्रोतृसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. त्यानंतर श्री. राम अय्यर आपल्या भाषणात म्हणाले, “वंदिस्त केलेल्या व निकृष्ट समजल्या जाणा-या ह्या समाजाच्या शृंखला तोडून त्यांची सामाजिक स्वातंत्र्याची आकांक्षा ह्या ठरावाच्या द्वारा प्रकट होत असल्यामुळे माझा त्यास पाठिंबा आहे.” राम अय्यर यांनी ‘आपल्याला जर स्वराज्य मिळवायचे असेल तर निकृष्ट समजल्या जाणा-या वर्गावरची बंधने आपण नष्ट केली पाहिजेत’ ह्या मुद्दयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “आपण राजकीयदृष्ट्या उदार व सामाजिक बाबतीत मात्र परंपरानिष्ठ हुकुमशाहीवादी होऊ शकत नाही. जो मनुष्य सामाजिकदृष्ट्या गुलाम असतो तो राजकीयदृष्ट्या कधीही स्वतंत्र असू शकत नाही हे लक्षात ठेवा. आपण येथे जे जमलो आहोत ते ख-याखु-या एकात्म भारताचे स्वप्न पाहण्यासाठी. केवळ राजकीयदृष्ट्या एक होऊ पाहणा-या भारताचे दृश्य पाहण्यासाठी नव्हे.... आपल्या अध्यक्षांपासून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. त्या तुम्हाला आणि मला स्वतंत्र करण्यासाठी स्वकीयांबरोबर लढा देत आहेत. म्हणून मी सर्व ब्राह्मणवर्गाला व वरच्या जातींच्या लोकांना आवाहन करतो की, आपआपल्या गावी जाऊन हलक्या समजल्या जाणा-या लोकांवर लादलेली बंधने दूर करा.” श्री राम अय्यर यांचे भाषण संपल्याबरोबर डॉ. अँनी बेझंट श्रोत्यांना उद्देशून म्हणाल्या, “श्री. राम अय्यर मलबारी ब्राह्मण असून ते आता जे बोललो त्याबरहुकूम ते वागतही असतात.” त्यावर श्रोत्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्यानंतर श्री. असफअली यांनी ठरावास पाठिंबा दिला. ते म्हणाले, “अस्पृश्यांना निष्ठुरपणे वागवणा-या उच्चवर्गीयांप्रमाणे तेही याच मातृभूमीची लेकरे आहेत त्यांच्याप्रमाणेच अस्पृश्यवर्गाच्या शरीरातूनसुद्धा लाल रक्तच वाहते. माणूस म्हणून जगण्याचा जो मूलभूत हक्क आहे त्यापासून त्यांना वंचित करता येणार नाही. अस्पृश्यता अस्तित्वात असणे हा खरे म्हणजे भारतीयांवर असलेला कलंक आहे व तो ताबडतोब नाहीस करणे आवश्यक आहे.” या भाषणाबरोबरच कलकत्त्याचे एस्. आर. बम्मनजी, पुण्याचे एस्. के. दामले यांनी अनुमोदन दिल्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.२


ह्या ठरावाच्या अनुरोधाने जी भाषणे झाली त्यांमध्ये तत्कालीन स्वदेशीच्या चळवळीची तीव्र जाणीव जशी प्रकट होते त्याचप्रमाणे अस्पृश्यतानिवारण करण्याच्या कामाबद्दल ह्या मंडळींना खरोखरीची तळमळ वाटत होती असेही दिसून येते. हा ठराव राष्ट्रसभेने मंजूर कराव हे शिंदे यांना उत्कटत्वाने वाटत होते याचे कारण असे की, काँग्रेसने हा ठराव मंजूर केल्यानंतर काँग्रेसच्या प्रांतिक परिषदा, जिल्हा पातळीवरच्या सभा अशा सर्वच ठिकाणी हा ठराव मंजूर होईल व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासंबंधी देशभर पातळीवरच्या सभा अशा सर्वच ठिकाणी हा ठराव मंजूर होईल व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासंबंधी देशभर एक सार्वत्रिक स्वरूपाची जाणीव निर्माण होईल. शिंदे यांच्या अटकळीप्रमाणे ह्या प्रक्रियेला महाराष्ट्रात सुरुवातही झाली. लोणावळा येथे प्रांतिक पातळीवर हा ठराव एकमताने मंजूर झाला. लो. टिळकांसारख्या परंपरानिष्ठ समजल्या जाणा-या पुढा-याचाही पाठिंबा ह्या ठरावाला प्राप्त झाला. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य आणि ह्या कामाच्या आवश्यकतेबद्दलची जाणीव देशव्यापी पातळीवर नेण्याचा यांचा हेतू सफळ व्हावयास राष्ट्रसभेच्या या ठरावाच मोठाच हातभार लागला.


संदर्भ
१.    श्री. व्यं. केतकर(संपा.) महाराष्ट्रीय ज्ञानकोश, विभाग ७, महाराष्ट्रीय ज्ञानकोशमंडळ, पुणे, १९२४, पृ. (अ)३४७.
२.    जितेंद्रलाल बँनर्जी, रिपोर्ट ऑफ दि थर्टी सेकंड सेशन दि इंडियन काँग्रेस, कलकत्ता १९१८.

ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शेवटची तिसरी टर्म १ मे ते ३० जून अशी दोन महिन्यांची असे. १९०३ मधील मे आणि जून हे दोन महिने म्हणजे शिंदे यांच्या मँचेस्टर कॉलेजमधील अध्ययनाची अखेरची टर्म होती. या टर्मच्या अखेरीबरोबर त्यांचे ऑक्सफर्ड येथील वास्तव्यही संपणार होते. कॉलेजमधील प्रोफेसरांचा व मित्रांचा तसेच विश्वविद्यालयाचा निरोप घेण्याचे दिवस जवळ येत चालले तसतशी शिंदे यांना फार हुरहूर वाटू लागली.

पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्समुल्लर, डॉ. मार्टिनो वगैरे अत्यंत नामांकित मंडळींचे ग्रंथ वाचून त्यांच्यावर शिंदे यांची श्रद्धा बसली होती. ते इंग्लंडात गेले तेव्हा त्यांच्यापैकी कोणी हयात नव्हते. प्रो. मॅक्समुलर यांचे घर युनिव्हर्सिटी पार्कजवळच होते. तेथे ते मिसेस् मॅक्समुल्लर यांना भेटण्यास गेले. आपल्या नव-याचा एक हिंदी चाहता आणि अनुयायी आपल्याला भेटावयाला आला याचा त्यांना फार संतोष वाटला. शिंदे लवकरच इंग्लंड सोडणार असल्यामुळे त्यांचा स्वदेशातील पत्ता विचारून घेतला. ते स्वदेशी आल्यानंतर ह्या बाईंनी प्रो. मॅक्समुल्लरची सर्व प्रसिद्ध लेक्चर्स, तुलनात्मक धर्मावरील पुस्तके आणि हिंदू षड्दर्शने अशी पुस्तके त्यांना भेट म्हणून पाठविली.

ऑक्सफर्डपासून दीड-दोन मैलांवर बेंझी नावाचे एक अगदी लहान खेडे होते. तेथे एक जुने, ओसाड उपासना मंदिर होते. शिंदे केव्हा केव्हा विश्रांतीसाठी तेथे जात. शेवटचा एकांतवास करण्यासाठी ते तेथे गेले व दोन वर्षांचे सिंहावलोकन केले. ऑक्सफर्ड सोडण्याच्या कल्पनेने त्यांना उदासीन वाटत होते. मात्र याच काळात ऑक्सफर्ड शहरात आनंदाचा मोठा गलबला माजला होता. टर्मच्या या आठवड्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी ऑक्सफर्डला घडत. त्यांपैकी एक बोटींच्या शर्यती आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा वार्षिक पदवीदान समारंभ.

टर्मच्या शेवटच्या आठवड्यास ‘एट्स वीक’ म्हणत असत. ह्या आठवड्यात निरनिराळ्या कॉलेजच्या आठ बोटींची टेम्स नदीवर चुरशीची शर्यत (म्हणजे Regatta) होत असे. ऑक्सफर्डजवळील टेम्स नदीच्या भागाला आयसीस हे नाव आहे. आठही कॉलेजचे प्रत्येकी आठ आठ विद्यार्थी एकेका बोटीत बसलेले असत. कॉलेजातील बहुतेक विद्यार्थी आपापल्या बोटींच्या बाजूने किना-याने उभे असत. बोटी वेगाने धावू लागल्या म्हणजे किना-यावरील मंडळी बेहोष होऊन ओरडत, कर्णे फुंकत, हातवारे करीत धावत असत. ह्यात केव्हा केव्हा कॉलेजातील शिक्षकही भाग घेत. हा गदारोळ आठवडाभर चालत असे.

विठ्ठल रामजी शिंदे हे ज्या काळी ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेत होते त्या काळी स्त्रियांना पदवी देण्याची तयारी ह्या कर्मठ विद्यापीठाने दाखविली नव्हती. तेव्हा स्त्रियांची कॉलेजेस ऊर्फ हॉल्स होते. तेथे स्त्रियांना शिक्षण घेण्याची मुभा होती. मात्र परीक्षेत पास होणा-या विद्यार्थिनींना विद्यापीठातून पदवी दिली जात नसे. पास झालेल्या स्त्रियांना पदव्या मिळाव्यात असा विचार ह्या सुमारास पुढे आला तेव्हा पुरुष विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आणि दंगा केला. कॉलेजच्या खिडक्यांची तावदाने फोडून काढली. शिंदे यांना खिडक्यांची फुटलेली तावदाने पाहताना आपण जणू काय विद्यार्थिनींच्या भग्न आशाच पाहत आहोत असे वाटले.

पदवी देण्याच्या बाबत कर्मठ असणारे हे विद्यापीठ स्त्रियांचा शिक्षणातील सहभाग मात्र चालू ठेवीत होते व स्त्रियांना सामाजिक जीवनात प्रतिष्ठाही देत होते. ह्या विद्यापीठाची प्रतिष्ठा दांडगी होती. श्रीमंतांची, अमीर-उमरावांची मुले या विद्यालयात सामाजिक व संभावित वळण मिळावे यासाठी येत असत. शिंदे यांच्या काळात ऑक्सफर्डमधील सतरा-अठरा कॉलेजांतून चार-पाच हजार विद्यार्थी शिकत असत. ह्या आठवड्यात होणा-या बोटींच्या शर्यती, इतर संमेलने आणि पदवीदान समारंभ यासाठी विद्यार्थी आपल्या स्त्री-नातलगांना बोलावून घेत असत. सभा, संमेलने, पार्ट्या, भोजने इत्यादी प्रसंगांची यावेळी गर्दी उडत असे. इंग्रजी विवाह स्वयंवर पद्धतीचा असल्यामुळे परस्पर परिचयाला हा काळ फार अनुकूल ठरतो. इंग्रज समाजाचा ध्येयवाद व्यवहाराल नेहमी समांतर असतो असे आपले निरीक्षणही शिंदे यांनी नमूद केले आहे.१

२४ जून १९०३ रोजी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा मोठा वार्षिक पदवीदान समारंभ झाला. समारंभाचे स्थळ शेल्डोनियन थिएटर दोन हजार लोकसमुदायाने गच्च भरले होते. त्यात तीनचतुर्थांशावर स्त्रियाच होत्या. बोटीच्या शर्यतीच्या आधीच्या आठवड्याप्रमाणेच हा आठवडाही मोठा चैनीचा असे. परीक्षा आटोपल्यामुळे विद्यार्थी मोकळे असतात. चोहीकडे नाच, मेजवान्या व खेळ चालतात. विद्यार्थी मुद्दाम बोलावून आणलेल्या बहिणी व मेहुण्या यांचा आदरसत्कार करण्यास उत्सुक असतात.

बारा वाजता सिनेटची मिरवणूक आत आली. सन्मानाच्या पदव्या देण्यासाठी बोअर युद्धातील यशस्वी वीर सर जॉर्ज व्हाईट होते. समारंभातील सर्व भाषणे लॅटिनमध्ये झाली. ही पुराणप्रियता शिंदे यांना त्या वेळीही हास्यास्पद वाटली. अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी गोंधळ करतात म्हणून त्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते आत प्रवेश मिळवीत असत. ह्या पदवीदानाच्या गंभीर प्रसंगी एकाने बायकांसारखा आवाज काढला, तर दुस-याने मांजराच्या आवाजाची नक्कल केली. व्हाईटसाहेबांनी काहीतरी बोलावे म्हणून तीन-चार मिनिटे टाळ्या वाजवून थिएटर दणाणून टाकले. मग त्यांचे भाषण सुरू असताना ते लवकर संपेना म्हणून गोंगाट व आरडाओरडा सुरू केला. पदवीदानासारख्या गंभीर प्रसंगी दंगा घालण्याचा आपला हक्क दंगेखोर विद्यार्थी जो जगभर बजावितात, त्याला निदान ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठाची शंभर वर्षांची तरी जुनी परंपरा आहे, असे नक्कीच म्हणता येते. ते काही असो, वर्षभर गंभीरपणे अध्ययन-अध्यापन ज्या विद्यापीठात चालू असते तिथला हा प्रसंग म्हणजे काही क्षणांचा केवळ करमणुकीचा भाग वाटावा एवढा नगण्य म्हणावा लागतो.

शिंदे यांचे विलायतेहून परत येण्याचे दिवस जवळ येत चालले. त्यांच्या प्रवासखर्चाबाबत एक विघ्न अनपेक्षितपणे उपस्थि झाले. विलायतेला येताना शिंदे यांना बोटीच्या प्रवासाचा खर्च श्रीमंत सयाजीराव महाराजांनी दिला होता व स्वदेशी परत जाण्याचा खर्चही देण्याचे त्या वेळीच मान्य केले होते. त्याप्रमाणे त्यांच्या कॉलेजातील अभ्यासाबद्दल कॉलेज अधिका-याकडून रिपोर्ट मागविण्यासंबंधी महाराजांकडून हुकूम झाला होता. त्याप्रमाणे मँचेस्टर कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. जेम्स ड्रमंड व शिंदे यांचे विशेष गुरू डॉ. जे. एस्लिन कार्पेंटर यांचे त्यांच्या अभ्यासाबद्दल रिपोर्ट महाराजांकडे पाठविण्यात आले. दोघांचे रिपोर्ट अत्यंत समाधानकारक होते.

प्रिन्सिपॉल ड्रमंड यांनी ४ मार्च १९०३ रोजी लिहिलेल्या प्रमाणपत्रामध्ये कॉलेज कमिटीला जून १९०२ मध्ये शिंदे यांच्याबद्दल सादर केलेल्या रिपोर्ट उद्धृत केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, त्यांनी ‘सेल्फ रियलायझेशन’, ‘जेनेसिस ऑफ फ्री वुइल’ असे दोन तत्त्वज्ञानात्मक स्वरूपाचे निबंध लिहिले असून त्यामध्ये त्यांनी विचारांचा स्वतंत्रपणा दाखविला आहे. हिंदुस्थानातील धर्माचा इतिहास या विषयावर त्यांनी पंधरवड्याला लिहावयाचे निबंध उत्तम लिहिले आहेत उन्हाळी टर्ममध्ये प्रो. कार्पेंटर यांच्यासमवेत पालीचा अभ्यास त्यांनी केला असून त्यांच्या संस्कृतच्या पूर्वतयारीमुळे उत्तम प्रगती केली आहे. शैव आणि बौद्ध धर्मातील अवतारकल्पनेबद्दल त्यांनी विचारप्रवर्तक निबंध लिहिलेला आहे. प्रो. जे. एस्लिन कार्पेंटर यांनी १ मार्च रोजी लिहिलेल्या प्रमाणपत्रात दोन्ही वर्षांमध्ये शिंदे यांनी धर्माचा इतिहास या विषयावर लिहिलेल्या निबंधामध्ये त्यांची उद्यमशीलता, दक्षता व आकलनाची आंतरिक दृष्टी दिसून येते असे म्हटले आहे. दुस-या वर्षी त्यांच्याकडून करून घेतलेले काम हे स्वाभाविकपणेच प्रगत स्वरूपाचे असून त्यांनी ते अत्यंत समाधानकारक रीतीने केलेले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये हिंदू धर्म, इस्लाम, झरतुष्ट्राचा धर्म आणि चीनचा धर्म एवढ्यांचा समावेश होतो.

दर आठवड्याला त्यांनी पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ माझ्यासमवेत वाचले असून त्यांना असलेल्या संस्कृत ज्ञानाच्या आधारे ते उत्तम प्रगती करू शकतात हे दाखवून दिल आहे.२

मँचेस्टर कॉलेजकडून महाराजांकडे हे रिपोर्ट गेल्यानंतर शिंदे यांनी प्रवासखर्चाबद्दल त्यांच्याकडे अर्ज केला असता सेक्रेटरीकडून पत्र ले की, ते स्वदेशी परत गेल्यावर बडोदे संस्थानात नोकरी करण्याबद्दलचा करार लिहून दिला तर हा खर्च मिळेल. शिंदे यांनी १ मे १९०३ रोजी महाराजांना स्वतंत्र खुलाशाचे पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले, “मला जी युनिटेरियन स्कॉलरशिप मिळाली होती तिची एक शर्त अशी होती की, मी आजन्म स्वतःला धर्मप्रचारासाठीच वाहून घेईन. यदाकदाचित माझ्या योगक्षेमाची कोणी जबाबदारी घेतली नाही तर या प्रचाराला प्रतिकूल होणार नाही असेच एखादे काम करून उदरनिर्वाह करीन; पण प्रचार सोडणार नाही. महाराजांनी हे सर्व पसंत केले होते. म्हणून आता कोणतीही हरकत न घेता स्वदेशी परत जाण्याला मला ते मदतच करतील”३ शिंदे यांनी पाठविलेल्या ह्या पत्रामुळे हा अनपेक्षित अडथळा दूर झाला. तसेच त्यांची प्रवासखर्चाची काळजीही मिटली. श्रीमंत सयाजीराव महाराजांकडे हे पत्र पोहोचताच त्यांनी टॉमस कुक कंपनीकडे तारेने तिकीट देण्याबद्दल हुकू केल्याचे त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीने शिंदे यांना कळविले.

शिंदे हे प्रवासखर्चाच्या अडचणीमुळे व्यस्त असताना त्यांना कलकत्ता येथील साधारण ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी श्री. हेमचंद्र यांनी एक महत्त्वाची वार्ता कळविली. ऍमस्टरडॅम येथे १ ते ४ सप्टेंबर १९०३ ह्या दिवशी भरणा-या आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेसाठी त्यांना ब्राह्मसमाजाने हिंदुस्थानचा प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. एरव्ही कॉलेजची उन्हाळी टर्म जून अखेरीस संपताच विठ्ठल रामजी शिंदे हे हिंदुस्थानला परत येऊ शकले असते. आता ऍमस्टरडॅम येथील परिषदेस त्यांना हजर राहावयाचे असल्यामुळे व ती परिषद सप्टेंबरला भरणार असल्याकारणाने दरम्यानचा तीन महिन्यांचा खर्च आणि जादा प्रवासखर्च यांची त्यांना फिकीर पडली. ह्या जादा होणा-या खर्चाची तरतूद करण्यासाठी मुंबई प्रार्थनासमाजातील त्यांचे मित्र श्री. बाबण बापू कोरगावकर यांनी वर्गणी गोळा करण्याचे परिश्रम घेऊन २५ जुलै १९०३ रोजी पत्राने १३ पौंड, ६ शिलिंग, ८ पेन्स म्हणजे दोनशे रुपयांचा चेक पाठविला. कलकत्त्याहून तेवढीच रक्कम मिळेल असे श्री. हेमचंद्र सरकार यांनी शिंदे यांना कळवले. त्यामुळे त्यांची जादा खर्चाची अढचण दूर झाली.

कॉलेजची उन्हाळी टर्म संपत आली आणि विठ्ठल रामजी शिंदे यांना आपल्याला ऑक्सफर्ड लवकरच सोडावे लागणार या जाणिवेने वाईट वाटू लागले. तसे म्हटले तर ऑक्सफर्ड येथील वास्तव्याचा काळ म्हणजे काही सुखासीन ऐश्वर्याच काळ नव्हता. त्यांना मिळणारी सालिना १०० पौडांची स्कॉलरशिप खर्चाची तोंडमिळवणी करण्याच्या दृष्टीने तशी तुटपुंजीच होती. सुटीच्या काळात अन्य ठिकाणांहून येणारी उपासनेची निमंत्रणे ते स्वीकारीत. त्याचा मोबदला म्हणून मिळणारी रक्कम खर्चाची तोंडमिळवणी करण्याच्या दृष्टीने उपयोगी पडत असे. काटकसरी राहणीमुळे त्यांना आर्थिक अडचण अशी जाणवली नाही. ऑक्सफर्ड येथील वास्तव्यात अध्ययनाच्या स्वरूपात त्यांना जे मिळाले ते कितीतरी नवीन आणि मौल्यवान होते. प्रोफेसरांचा आणि इतर विद्वानांचा त्यांना जो सहवास मिळाला त्यातून ते कितीतरी शिकले होते. एक प्रकारच्या आंतरिक धर्मप्रेरणेने त्यांनी आपले आयुष्य धर्मकार्यासाठी वेचण्याचे ठरविले होते. हे धर्मकार्य भावी आयुष्यामध्ये आपण समाधानकारकपणे पार पाडू शकू एवढा आत्मविश्वास त्यांना येथील वास्तव्यामधून आणि इंग्लंडभर त्यांनी केलेल्या निरीक्षणातून आला होता. त्यांची मुळातच व्यापक असलेली धर्मदृष्टी स्वच्छ झाली होती. त्यांच्या धर्मबुद्धीला येथील वास्तव्यात अनेक पैलू पडले आणि त्यांची धर्मजाणीव समृद्ध झाली. जीवनातील सर्व कार्याचे अधिष्ठान धार्मिकच असावयास पाहिजे अशी स्पष्टता त्यांच्या धर्मविचाराला आली. हे सारे येथे केलेल्या अध्ययनातून, गुरुजनांच्या उपदेशातून, अन्य विद्वानांच्या व धर्मनिष्ठांच्या सहवासातून, परोपकारी कार्य करणा-या संस्थांच्या निरीक्षणातून त्यांना प्राप्त झाले होते. ह्या सा-यांबद्दल त्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेची जाणीव निर्माण झाली. त्यांच्या आयुष्यातील दोन वर्षांचे हे सुखस्वप्न अखेर संपले. टर्म संपताच जुलैच्या प्रारंभी उन्हाळ्यातील सुटी सुरू झाल्याबरोबर त्यांनी दुःखद अंतःकरणाने ऑक्सफर्ड कायमचे सोडले.
संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १४०-१४१.
२.    तत्रैव, पृ. १४६.
३.    तत्रैव, पृ. १४२. शिंदे यांनी श्री. सयाजीराव महाराजांना पाठविलेले मूळ पत्र इंग्रजीत आहे. शिंदे यांची कागदपत्रे.

ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने

ऑक्सफर्डमध्ये आल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे प्रथम मिस्टर आणि मिसेस् ग्रेडन या दांपत्याच्या घरी ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहू लागले. इंग्लंडमध्ये काही मध्यम प्रतीचे लोक पाहुण्यांकडून पैसे घेऊन आपल्या घरी राहण्याची सोय करतात. ग्रेडन यांच्यासारख्या संभावित कुटुंबामध्ये राहिल्यामुळे इंग्रजी चालीरीतींची आणि सभ्यतेची माहिती मिळून त्यांचा मोठा लाभ झाला, असे त्यांना वाटले.

कॉलेजमध्ये सकाळी दहापासून दुपारी एकपर्यंत अध्यापकांची व्याख्याने असत. झालीच तर संध्याकाळी जाहीर व्याख्याने होत. रात्रीच्या वेळी चर्चामंडळाच्या सभा, संमेलने चालत. वर्षातून सहा महिने अभ्यास आणि सहा महिने सुट्टी असे आणि आठवड्यातून चार दिवस कॉलेज व शनिवार, रविवार, सोमवार हे सुट्टीचे दिवस असत. भार कशाचाच नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी करण्याबाबत विठ्ठल रामजी शिंदे यांना उत्साह वाटत असे.

धर्माचे अध्ययन हा त्यांच्या केवळ आवडीचाच नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्यांचे नेमलेल्या अभ्यासविषयाचे वाचन तसेच आनुषंगिक वाचन जोमाने सुरू झाले. ते आणि त्यांचे मित्र मिळून धर्मसाधन करू लागले. वादविवादाचा आणि चर्चेचा तर त्यांच्या ठिकाणी उदंड उत्साह होता. ‘मार्टिनो क्लब’, ‘डिस्कशन क्लब’ आणि ‘पॉझ क्लब’ अशी ती चर्चामंडळे कॉलेजात अस्तित्वात होती. पॉझ क्लब केवळ मँचेस्टर कॉलेजच्या विद्यार्थ्याचा. इतर दोन मंडळांमध्ये मँचेस्टर कॉलेजातील तसेच इतर कॉलेजांतील विद्यार्थ्यींनाही सभासद म्हणून निवडले जाई. विठ्ठल रामजी शिंदे तीनही चर्चामंडळाचे सभासद म्हणून निवडले गेले होते.

मार्टिनो क्लब हा मँचेस्टर कॉलेजचे नामवंत प्रोफेसर डॉ. जेम्स मार्टिनो (१८०५-१९००) यांच्या स्मरणार्थ काढला होता. वयाच्या ९४व्या वर्षी ११ जानेवारी १९०० रोजी त्यांचे निधन झाले. मँचेस्टर कॉलेजशी विद्यार्थी या नात्याने सुरू झालेल्या त्यांचा संबंध पुढील ७० वर्षे टिकला.१ १९०१-०२ ह्या वर्षासाठी क्लबच्या कमिटीचे अध्यक्ष ए. एच. थॉमस व सेक्रेटरी गॉर्डन कूपर हे होते. मँचेस्टर कॉलेजचे आठ विद्यार्थी सदस्य म्हणून ह्या वर्षासाठी निवडले गेले. त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे एक होते. ऑक्सफर्डमधील बॅलिओल, वॅड हॅम, एक्सिटर क्वीन्स इत्यादी कॉलेजमधूनही प्रतिनिधी निवडले होते. चर्चामंडलाचे एकंदर २८ सदस्य होते. यामध्ये जी. जी. राणे हेही एक नाव आढळते.

मार्टिनो क्लबच्या कमिटीची बैठक प्रेसिडेंटच्या खोलीमध्ये ७ नोव्हेंबर १९०१ रोजी भरली. ही बैठक प्राधान्याने नवे सदस्य निवडण्यासाठी होती. हया बैठकीच्या वृत्तान्तात असेही नमूद केलेले आढळते की स्त्रियांना निवडणुकीसाठी पात्र समजावे काय, यावर चर्चा झाली आणि विचारविनिमयानंतर असे ठरविण्यात आले की मँचेस्टर कॉलेजच्या नियमित अथवा खास विद्यार्थिनींना पात्र समजावे. मात्र याच वेळी सगळ्या उपस्थित सदस्यांनी सांगितले की सोसायटीच्या बैठकीसाठी अन्य स्त्रियांना मात्र निमंत्रित करू नये. मिस् जॉन्सन, मिस् पेटझोल्ड ह्या विद्यार्थिनींना त्याचप्रमाणे मँचेस्टर कॉलेजच्या अन्य सहा पुरुष विद्यार्थ्यांना सदस्य म्हणून निवडले. त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांची सदस्य म्हणून निवड केली गेली. बारनेस, टोयोसाकी हे शिंदे यांचे अन्य सोबतीही सदस्य म्हणून निवडले गेले.२

मार्टिनो क्लबचे प्रेसिडेंट थॉमस यांनी आदल्या दिवशी जाहीर केल्यानुसार शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी क्लबची बैठक झाली. विठ्ठल रामजी शिंदे हे सदस्य ह्या नात्याने बैठकीस गेले. संध्याकाळी ७ वाजता जेवण झाल्यानंतर व्ही. जी. चर्टकॉफ यांनी ‘रशियातील धार्मिक शिक्षण’ ह्या विषयावर निबंध वाचला. “चर्टकॉफ हे टॉलस्टॉयचे मित्र व अनुयायी, पक्के सोशॅलिस्ट व अनार्किस्ट होते.”३ हे टॉलस्टॉयच्या धर्मविचाराचा प्रभाव पडून त्यांचे कट्टर अनुयायी झाले. सैन्यातील अधिकाराची नोकरी व संपत्तीचा त्याग करून शेतक-यासारखे साधे जीवन जगू लागले. निबंधवाचनानंतर प्रश्नोत्तरे व चर्चा झाली. विठ्ठल राजमी शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्टकॉफनी आपली काही पुस्तके व स्तःबद्दलची माहिती त्यांना पाठवून देण्याचे कबूल केले. दुसरी सभा २९ नोव्हेंबर रोजी झाली. मँचेस्टरचे रे. एनफिड डॉसन ह्यांनी ‘टेनिसनच्या कवितेचे काही पैलू’ ह्यावर निबंध वाचला. तो विठ्ठल रामजींना फार चांगला वाटला. त्यावर वादविवादही मनोरंजक झाला. टेनिसनला सृष्टीचे चित्र जसेच्या तसेच वठविता येत होते पण वर्डस्वर्थप्रमाणे सृष्टीत दैवी तत्त्व दिसले नाही असा निबंधाचा व एकंदरीत वादाच रोख होता. शिंदे यांना हा विचार रास्त वाटला.४

धर्मविषयक वाचन आणि धर्मसाधन ह्या दोन्ही गोष्टी विठ्ठल रामजी शिंदे यांनी उत्सहाने चालविल्या होत्या. अँनी बेझंट यांचे पुनर्जन्म (Reincarnation) ह्या पुस्तकाचे वाचन ते करावयास लागेल होते. त्यांचा कॉलेज बंधू मि. कॉक हा थिऑसॉफिस्ट होता. कॉकबद्दल शिंदे यांना ममत्व वाटू लागले. १० नोव्हेंबर रोजी दुपारपासून संध्याकाळपर्यंत शिंदे कॉककडेच बोलत बसले. परस्परांची हकिकत समजून घेतली. कॉक व त्याची बहीण अशी दोघेच ऑक्सफर्डला विद्यार्थिदशेत आनंदाने दिवस घालवीत होते. ते दोघेही अत्यंत ममताळू, सात्त्विक व हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचे चाहते होते. कॉक हा स्वतः खाटकाचा मुलगा असून स्वतः खाटकाचा धंदा बरेच दिवस करून तो आणि त्याची बहीण शाकाहारी झाली होती. आध्यात्मिक भाव आणि भक्ती वाढविण्यासाठी नियमित वेळ आपण एकत्र जमून काही साधना करावे असे त्याने सुचविले. विठ्ठल रामजींच्या मनातही ते होतेच. त्याप्रमाणे त्या दोघांनीही धर्मसाधनासाठी दर शुक्रवारी रात्री नऊ वाजता एकत्र जमावयाचे ठरविले.

हिंदुस्थानात असताना विठ्ठल रामजी शिंदे कधी कधी मांसहार करीत होते पण तो अजिबात सोडावा असे त्यांना वाटत होते. लंडनमधून येताना त्यांनी शाकाहार पुरस्कर्त्यांची काही पुस्तकेही विकत घेतली होती. मि. कॉकच्या उदाहरणामुळे पूर्ण शाकाहारी होण्याचा त्यांचा विचार बळावला. घरी आल्यानंतर जेवताना मिस्टर आणि मिसेस् ग्रेडन यांच्याशी मांसाहाराबद्दल कडाक्याचा वाद झाला. दुस-या दिवसापासून ग्रेडन मंडळींचा आग्रह न जुमानता केवळ शाकाही अन्न घेण्यास त्यांनी सुरुवात केली.

पुढच्या शुक्रवारी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी शिंदे हे मि. शोन, मि. बार्न्स यांच्यासह आध्यात्मिक साधनासाठी कॉक यांच्या घरी जमले. कॉकने सुचविले की प्रत्येक आठवड्यास एकाने कुणातरी मोठ्या साधूचा विचार वाचून दाखवावा किंवा त्याचा विशेष ऊहापोह करावा. शोनबरोबर विठ्ठल रामजींचा युनिटेरियन मताविषयी थोडा वाद झाला. बार्न्सने सुचविले की, आपण जमल्यावर पाचदहा मिनिटे स्वस्थ समाधिस्थ बसावे व कुणास काही स्फूर्ती अगर प्रेरणा झाल्यास तिच्याविषयी सर्वांनी विचार करावा. ह्याप्रमाणे ६ डिसेंबरपर्यंत चार साधनसभा झाल्या. ६ डिसेंबरच्या साधनसभेत प्रर्थना झाल्यानंतर विठ्ठल रामजींनी ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव...’ ह्या भगवद्गीतेतील श्लोकावर विवेचन केले. नंतर अद्वैत, कर्म, पुनर्जन्म इत्यादी पौरस्त्य सिद्धान्ताबद्दल चर्चा झाली. ह्या सभेला लिंकन कॉलेजचे रो नावाचे गृहस्थ उपस्थित राहिले होते. शोन हे कॉकप्रमाणेच थिऑसॉफिस्ट होते. धर्मविषयक बाबींवर चर्चा करण्यात त्यांना गोडी वाटत होती.

ऑक्सफर्डमधील वेगवेगळ्या चर्चमध्ये उपासना पाहण्याची व सर्मन ऐकण्याची संधी सोडीत नसत. एक तर धर्माबद्दल त्यांच्या ठिकाणी अत्यंत कळकळ होती. दुसरे म्हणजे, स्वतःची युनिटेरियन उपदेशक म्हणून तयारी करण्याच्या दृष्टीने जेवढ्या म्हणून उपासना पाहावयास मिळत तेवढ्या त्यांना हव्या असत. १७ नोव्हेंबरच्या रविवारी सकाळी साडेदहा वाजता युनिव्हर्सिटी चर्चमध्ये त्यांनी सर्मन ऐकले. नंतर त्यांच्या कॉलेजमधील देवळात प्रोफेसर रेव्ह. ऍडिस यांनी चालविलेल्या उपासनेला ते उपस्थित राहिले आणि संध्याकाळी ख्राइस्ट चर्च कॉलेजच्या देवळात ते उपासनेला गेले. तेथील उपासना एपिस्कोपल चर्चच्या नमुन्याप्रमाणे होती. हा पंथ रोमच्या पोपच्या प्रभुत्वापासून फुटून निघालेला पंथ असून धर्मगुरू नेमण्याचा पोपचा अधिकार त्यांनी झुगारला. अशा त-हेने एका रविवारी तीन उपासनांना ते उपस्थित राहिले. १ डिसेंबरला त्यांच्या कॉलेजच्या मंदिरात प्रो. कार्पेंटर यांचा ‘लिव्हिंग प्रॉव्हिडन्स’ अथावा ‘जिवंत जागृत देव’ ह्या विषयावर उपदेश झाला. तो त्यांना अतिशय प्रेरणादायी व धार्मिक सुखाचा अनुभव देणारा वाटला.

विठ्ठल रामजींना धर्माभ्यासात आणि धर्मचिंतनात गोडी होती त्याचप्रमाणे लोकजीवनाबद्दलही आस्था होती. गायकवाड, मित्र, राणे, कॉक यांसारख्या मित्रांकडे ते फिरायला जाण्यासाठी, चहा पिण्यासाठी वा गप्पा मारण्यासाठी कधीमधी जात असत. शामराव गायकवाड यांच्याबरोबर एकदा ते शहरापासून दोन-अडीच मैल फिरावयास गेले होते. एका शेतात मजूर नांगरीत होता. त्याला त्यांनी माहिती विचारली. शेतमजुराला आठवड्याला बारा-पंधरा शिलिंग मजुरी मिळते ही माहिती त्यांना मिळाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सायकलवर बसण्याचा सराव त्यांनी केला. २३ नोव्हेंबरला शोनबरोबर टेम्स नदीवर ते फिरायला गेले व पहिल्यांदाच नाव वल्हविली व दीड मैलाचा फेरफटका मारला.

मि. ग्रेडन यांचे कुटुंब मध्यमवर्गातील असल्याने त्यांच्याकडे पाहुण्यांची बरीच वर्दळ असे. विद्यार्थी या दृष्टीने त्यांच्या घरातील वास्तव्य असावे तितके सोयिस्कर नव्हते. त्याशिवाय काटकसरीच्या दृष्टीनेही विठ्ठल रामजी यांनी एकत्र राहण्याचा विचार करून जागेचा शोध घेतला. वुर्स्टर प्लेस या नावाच्या मध्यम वस्तीच्या भागात पिअर्सन कुटुंबाच्या ३३ नंबरच्या घरातील पहिल्या मजल्यावरील जागा ह्या दोघांनी मिळून घेतली व १६ नोव्हेंबरपासून तेथे राहावयास गेले. दोघांसाठी दोन निजण्याच्या खोल्या असून दोघांना बसण्याला आवश्यक ते फर्निचर असलेली एक समान खोली होती.

पिअर्सन कुटुंब हे मध्यम स्थितीतील अगदी खालच्या दर्जाचे होते. गरीब स्थितीतील कुटुंब सबंध घर भाड्याने घेऊन आपण तळमजल्यात राहून इतर मजले सभ्य गृहस्थास भाड्याने देऊन आपली गुजराण करते. कुटुंबातील मालकीण म्हणजे लँड लेडी पाहुण्यांचे जेवणखाण, स्नानाची, कपडे वगैरे धुण्याची व्यवस्था पाहत असते. मिस्टर पिअर्सन ऑक्सफर्डच्या एका मोठ्या हॉटेलात वाढप्याचे काम करीत होते. ह्यांना दोन मुले व चार मुली होत्या.

पिअर्सन कुटुंब हे अत्यंत साधे, गरीब व प्रामाणिक होते. ऑक्सफर्डचा विद्यार्थी व त्यातल्या त्यात धर्मशिक्षणाचा विद्यार्थी याचा दर्जा इंग्लंडात फार मोठा समजला जातो. स्वाभाविकपणे पिअर्सन कुटुंबातील लहानथोर माणसांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना फार आदबीने वागविले. पिअर्सन कुटुंबीयांच्या अगत्यशील वागणुकीमुळे ऑक्सफर्डमधील वास्तव्यकाळात पुन्हा बि-हाड बदलण्याची त्यांना गरज वाटली नाही. त्यांची सर्वात मोठी मुलगी अलाईस हिच्याकडे पाहुण्यांची सर्व व्यवस्था पाहण्याचे काम होते. दाट परिचय झाल्यावर विठ्ठल रामजी पुढे आपणहूनच एखाद्या वेळी तळघरातील स्वयंपाकघरात मिसेस् पिअर्सनकडे खेळीमेळीने जात. तेव्हा सर्व कुटुंबाला आपला सन्मान झाल्यासारखे वाटे. अलाईसचे वय सुमारे बावीस वर्षांचे होते. तिच्या पाठीवर विली व फ्रँक असे भाऊ होते आणि त्यांच्या पाठीवर नेली, मेरी व मॅगी अशा तीन मुली होत्या. मॅगी तीन वर्षांचीच होती. विठ्ठल रामजी सर्व मुलांना घेऊन एखाद्या रविवारी फिरण्यास जात असत. नेली आणि मेरी ह्यांच्याशी त्यांची विशेष गट्टी जमली होती.

विठ्ठल रामजी शिंदे हे माणसांकडे आध्यात्मिक अंगाने पाहत असत. ही त्यांची विचारदृष्टी पुढील काळात त्यांनी केलेल्या व्यक्तींच्या आकलन-मूल्यमापनावरून दिसून येते. त्यांच्या ह्या वैशिष्ट्याचा आढळ त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनच दिसून येतो. पिअर्सन कुटुंबात राहायला आल्यानंतर चार दिवसांनंतरची गोष्ट. २० नोव्हेंबर १९०१च्या रोजनिशीत त्यांनी लिहिले आहेः (मि. जॅक्सच्या लेक्चरनंतरच्या विद्यार्थाने चालविलेल्या)­ “मी आजच्या उपासनेला बसलो नाही. मी घरी येऊन मिस् पिअर्सनशी बोलत बसलो. ह्या संभाषणाने मला वरील ठरावीक व्याख्यानापेक्षा अधिक ज्ञान मिळाले. इतकेच नव्हे तर माझी आध्यात्मिक उन्नती झाली.” विठ्ठल रामजींनी हे विधान का केले आहे याची स्पष्टता नोंदीच्या अखेरच्या भागात होते. “आज काही वेळ अलाईस हिच्याशी बोललो. ही किती साधी आहे. पोशाख साधा, हिचे रूप साधे, हिची बुद्धीही साधी (साधारण) तसेच मनही साधे (सरळ.). कला आणि कावेबाजी ह्यांचा हिला स्पर्शही नाही. आपल्या उणिवा छपविण्याची हिच्यात शक्ती नाही. तशीच इच्छाही नाही; इतकेच नव्हे तर आपल्या उणिवांबद्दल हिला असमाधानही वाटत नाही; हिच्यात कोणतीही नैतिक वाण दिसत नाही. म्हणून हिचा हा भोळा व मुग्ध स्वभाव हिला फारच शोभतो. गरीब स्थितीतील हे निष्कलंक अंतःकरण पाहून माझ्या आध्यात्मिक शिक्षणात बरीच भर पडली!!”६

ऑक्सफर्डमध्ये विठ्ठल रामजी रमले होते. नवे ज्ञान मिळत होते. नवा विचार कानावर पडत होता. वाचायला मुबलक पुस्तके होती. तळमळीने शिकविणारे अध्यापक होते. मनापासून चर्चा करणारे अगत्यशील मित्र होते. फिरायला जायला टेम्स नदीचा काठ होता. नौकाविहाराची सोय होती. शोनसारख्या कॉलेजबंधूची घरात सोबत होती. आतिथ्यशील प्रेमळ असे पिअर्सन कुटुंब त्यांची काळजी घ्यायला होते. ऑक्सफर्डमधील दिवस आनंदात चालले होते.

संदर्भ
१.    दि इन्क्वायरर, लंडन, २० जानेवारी १९००.
२.    मिनिट बुक ऑफ मार्टिनो क्लब, मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड, फेब्रुवारी १८९७ पासूनची हस्तलिखित वही, मँचेस्टर कॉलेज ग्रंथालय, ऑक्सफर्ड.
३.    विठ्ठ रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ६९.
४.    तत्रैव, पृ. ७५.
५.    तत्रैव, पृ. ७४.
६.    तत्रैव, पृ. ७४.

एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे

एडिंबरोला जाण्याच्या आधी कार्लाइल शहरी त्यांनी रेव्ह. आर्लाश यांच्याकडे तीन दिवस मुक्काम केला. रेव्ह. आर्लाश हे कार्लाइल शहरापासून दूर असलेल्या इगलवुड नावाच्या जुन्या वाड्यात राहत होते. ह्या मुक्कामात त्यांनी कार्लाइल येथील कॅथीड्रल किल्ला पाहिला. ह्या स्थळाबद्दल ऐतिहासिक माहिती मिळवली. दोन-तीन दिवसांच्या मुक्कामानंतर ३१ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास ते एडिंबरो येथे पोहोचले. आगबोटीवर मित्र झालेले हैदराबादचे श्री. नायडू यांनी विठ्ठल रामजींसाठी मार्चमाँट क्रेसंट नंबर ४६ येथे मिसेस् सॉमर्व्हील ह्या लॅण्डलेडीकडे बि-हाड ठरविले होते.

समुद्रकाठी टेकड्यांच्या चढउतारावर वसलेले स्कॉटलंडचे हे राजधानीचे शहर विठ्ठल रामजी शिंद्यांना सगळ्या ग्रेट ब्रिटनमध्ये सुंदर वाटले. शहराचा बांधा पाखरासारखा आटोपशीर व टुमदार वाटला. लंडन शहर मात्र त्यांना बोजड व अस्ताव्यस्त पसरलेले वाटले होते.

संध्याकाळी ते ‘ब्लॅकफर्ड हिल’ या नावाच्या शहरापासून नजीक असलेल्या, गवत आणि झुडपे यांनी झाकून टाकलेल्या उंच टेकडीवर फिरावयास गेले. उन्हाळ्याचे दिवस असूनही थंडी वाजावी अशी थंडगार हवा होती. टेकडीवरून एडिंबरोचा देखावा सौम्य, शांत व सुंदर दिसत होता. तरुण जोडप्यांची ही टेकडी मोठी आवडती दिसली. त्यांनी लिहिले आहे, “टेकडीच्या वळणांतून, खाचखळग्यांत, झुडपांखाली, गवतातूनही प्रेमाने बद्ध झालेली जोडपी सर्व जगास विसरून आपापल्यातच गर्क झाली होती. वाटेने जाताना अवचितच अनपेक्षित अशा अवघड ठिकाणी जोडपे पाहून चमत्कार वाटे. न जाणो चुकून एखाद्यावर पाय पडेल म्हणून आजूबाजूस पाहून चालावे लागले. मानवी प्रेमाचे हे स्वाभाविक प्रदर्शन पाहून ज्यास विषाद वाटेल तो खरा हतभागी, करंटा, खोट्या तत्त्वज्ञानाने बिघडलेला, खोट्या नीतीच्या कल्पनांनी कुजलेला म्हणावयाचा. मि. फर्ग्युसन, आमच्या कॉलेजचा सीनियर विद्यार्थी एकदा म्हणाला, जगात ह्या देखाव्यापेक्षा अधिक सुख मला कोणत्याही देखाव्याने होत नाही. मला त्याच्या म्हणण्याचा रस कळला!”१ प्रेम मग ते कोणत्याही नात्यातून प्रकट होणारे असो, शिंदे यांना आनंददायक वाटत असे. त्यामध्ये त्यांना एक प्रकारची आध्यात्मिकता जाणवत असणार. जीवनातील सारभूत वस्तू प्रेम ही असून “ह्या प्रेमावीण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे नुसते अस्तित्वच उरते”, असे त्यांनी महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या मृत्यूनंतर केलेल्या उपदेशसमयी तीनएक वर्षांनंतर म्हटले आहे.२

एडिंबरोमधील आठवड्याच्या मुक्कामात अनेक प्रेक्षणीय स्थळे बघितली. एडिंबरोचा किल्ला व चित्रसंग्रह बघितले. सिव्हिल सर्व्हिसकरता बेळगावहून आलेले श्री. भाटे यांची गाठ पडली.३ त्यांची राजकीय मते जहाल होती. भाटे यांच्या उत्साही स्वभावामुळे शिंदे यांचा त्यांच्याशी स्नेहभाव जुळला. नायडू व भाटे यांच्यासमवेत शिंदे यांनी आपल्या मुक्कामात बरीच प्रेक्षणीय स्थळे बघितली. भाटे यांच्याबरोबर होलीरूड राजवाडा पाहिला. प्रिन्सेस स्ट्रीटवर असलेले स्कॉटचे आकर्षक स्मारक पाहिले. एके दिवशी एडिंबरोपासून नऊ मैल दूर असलेला मैलापेक्षाही जास्त लांबीचा दणकट, लोखंडी फोर्थ ब्रिज या नावाचा पूल पाहिला. ह्या पुलावरून समुद्राचा, खाडीचा व हिरव्याशार टेकड्यांचा सुंदर देखावा पाहिला. शिंदे अशी रम्य ठिकाणे बघत होते, त्याचप्रमाणे शक्य असेल तेव्हा वेगवेगळ्या चर्चमध्ये उपासनेला जात होते.

३ ऑगस्टच्या रविवारी सकाळी ते कथबर्ट चर्चमध्ये उपासनेला गेले. संध्याकाळी फ्री सेंट चर्चमध्ये उपासनेस गेले. रेव्ह. ब्लॅक ह्या तरुण उपदेशकाचा उपदेश शिंदे यांना फार आवडला. रेव्ह. ब्लॅकच्या प्रतिपादनात दुराग्रह नव्हता. त्यांनी कर्मठ मते मांडली नाहीत. जुन्या धर्मांचे उपदेश जर अशा पद्धतीने होत राहिले तर युनिटेरियन चळवळीचा झपाट्याने प्रसारही होणार नाही व त्याची जरुरीही भासणार नाही असे त्यांच्या मनात येऊन गेले. त्यांची धर्म दृष्टी खरीखुरी उदार आणि अभिमाननिरपेक्ष बनली होती हे यावरून जाणवते.

शिंदे यांनी एडिंबरो येथील सार्वजनिक मोफत वाचनालय पाहिले व त्यामुळे ते प्रभावित झाले. एडिंबरो सेंट्रल लायब्ररीची इमारत जॉर्ज फोर्थ पुलाजवळ आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे सार्वजनिक वाचनालय पाहिले त्या वेळेला सुमारे ४८, ००० पुस्तके ग्रंथालयात होती. खालच्या मजल्यावर वर्तमानपत्रे व मासिके वाचण्याची सोय होती व सुमारे शंभर मजूर तेथे वाचन करीत असलेले दिसून आले. मजूर लोकांना काम मिळेनासे झाले म्हणजे ते तेथे जाऊन बसत व मासिके अथवा पुस्तके वाचीत. त्यांना इमारत भव्य, सुंदर व स्वच्छ वाटली. या मोफत वाचनालयातील उत्तम व्यवस्था पाहून व गरीब लोकांच्या वाचनाची तेथे केलेली मोफत सोय पाहून “हे खरे लोकशिक्षण” अस विचार शिंदे यांच्या मनात आला.४

आपला एडिंबरो येथील मुक्काम संपवून विठ्ठल रामजी शिंदे ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता ग्लासगो या कारखान्याच्या व मजूर वस्तीच्या शहरी गेले. वाय. एम. सी. क्लबमध्ये ते उतरले. लखनौचे अजीझ अहमद या गृहस्थांची त्यांनी भेट घेतली. अहमद यांनी एका इंग्रज बाईंशी लग्न केले होते. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, पण मते ब्राह्म होती. मुलांची नावे मात्र मुसलमान धर्मांतील हैदरी, सखिना व उस्मान अशी ठेवली होती. सर्व कुटुंबीय शिंदे यांना फार मनमिळाऊ व अगत्यशील वाटले. अहमद हे ह्या शहरात हिंदुस्थानातून जे मजूर खलाशी येत असत त्यांना साहाय्य करणे, तेथील रीतिरिवाजांची कल्पना देणे वगैरे प्रकारे उपयोगी पडत असत.

९ ऑगस्ट हा बादशहाच्या राज्यभिषेकाचा दिवस होता. त्यानिमित्त होणा-या उपासनेला ते कॅथीड्रलमध्ये गेले. त्यांना अगदी पुढची जागा मिळाली. उपदेशक पूर्वी मद्रासला बिशप होते. हिंदुस्थानसंबंधी बोलताना त्यांनी शिंदे यांचा आवर्जून उल्लेख केला. फेट्यामुळे आपल्याला नेहमीप्रमाणे मान मिळाला असे म्हणून शिंदे यांनी गमतीने लिहिले, “मी फेट्याचे आभार मानले.” राज्यभिषेकानिमित्त ग्लासगो शहरात रात्री झालेली मोठी रोषणाई व लोकांचा उत्साह शिंदे यांना पाहावयास मिळाला. दुस-या दिवशी रविवारी तेथील युनिटेरियन मंदिरामध्ये ते उपासनेला गेले. ग्रेट ब्रिटनमध्ये लंडनच्या खालोखाल लोकसंख्या असलेल्या, कारखानदारीने गजबजलेल्या काहीशा बकाल अशा शहरातील आपला तीन दिवसांचा मुक्काम आटोपता घेऊन ११ ऑगस्टच्या सकाळी विठ्ठल रामजी शिंदे लाख लोमंड ह्या सरोवराला जाण्यास निघाले.

ग्लासगोच्या एका धुरकटलेल्या बोगद्यातून शिंदे यांची आगगाडी निघाली आणि सकाळच्या प्रहरी ते क्लाईड नदीच्या खाडीत निवांत पाण्यावर पोहोचले, तेव्हा त्यांच्या मनाला केवढीतरी ‘आराणूक’ वाटली. निवांतपणासाठी आसावलेल्या शिंद्यांना इथेही गर्दी चुकली नाही. त्यांना वाटले इतका वेळ कामात गुंतलेल्यांच्या गर्दीत होतो; तर आता विश्रांती घेणा-यांच्या गर्दीत पडलो. ज्या  बोटीवर ते चढले ती बोट आधीच भरून गेली होती. डोंगराच्या खबदडातही सुखाचे प्रत्येक साधन पुरविणारी हॉटेले आहेत. प्रवासाचे दर कमी करून भपकेदार वर्णनाची गाईडबुके लिहून व जाहिराती देऊन व्यापारी लोक गि-हाइकांस घरातून बाहेर काढतात. तशात फॅशनदेवीचे नवस पुरविणे इकडे फार जरुरीचे झाले आहे. ज्या ठिकाणी हिवाळा व पावसाळा घालविला, तेथेच उन्हाळ्यातही राहणे इकडच्या संभावितपणाला शोभत नाही वगैरे गर्दी होण्याची कारणे त्यांच्या मनात आली. पण त्यांना आश्चर्य वाटले ते हे की, ह्या लोकांची विश्रांती घेण्याची त-हाही दगदगीचीच.

त्यांची आगबोट क्लाईड नदीच्या रुंद खाडीतून लॉख लाँग नावाच्या सुंदर, चिंचोळ्या सरोवरात शिरली आणि पश्चिम भागातील हायलँड नावाच्या डोंगरी प्रदेशात वर वर जाऊ लागली. प्रत्येक वळशासरशी नवेच दृश्य दिसे. आता सरोवर संपले, पुढील खडकावर आता उतरणार असे त्यांना वाटावे तोच पुन्हा पाणी आणि पर्वत, गवत, वृक्ष आणि वेली यांचे अकल्पित नवे मनोहर दृश्य दिसू लागावे. अखेरीस लॉख लाँगच्या शिरोभागी ऍरोखर नावाच्या बंदरात आगबोट रिकामी झाली. तेथील ब्रॅड्स हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला.

स्कॉच सरोवराची राणी समजले जाणारे लॉख लोमंड सरोवर त्यांच्या मुक्कामापासून दीड मैल अंतरावर होते. दुस-या बाजूस चार-पाच मैलावर सर वॉल्टर स्कॉट ह्यांच्या ‘लेडी ऑफ द लेक’ ह्या काव्यातील मुख्य स्थळ लॉख कॅट्रेन होते. सरोवराच्या शिरोभागी ट्रोसॉक नावाच्या मनोहर दरीकडे जाताना ह्या काव्यातील नायिकेचे सुंदर ठिकाण एलनस आईल हे लागते. या ठिकाणाहून नौकेतून जात असता विठ्ठल रामजी शिंदे यांचे अंतःकरण सद्गगदित झाले. त्यांच्या मनात आले, “यावतकाळ हा डोंगर, हे सरोवर व ही दरी पृथ्वीवर राहतील तावतकाळ स्कॉटच्या नावाला व त्याच्या साध्या सरळ व सोप्या भारतीला बाध येणार नाही ही साक्ष पटते. मी दरीत शिरलो तेव्हा :
“All in the Trossak’s glen was still,
Noon tide was sleeping on the Hill.”
हा कवीचा दाखला मला प्रत्यक्ष पटला ! येथून पाऊल परत घेणे जिवावर आले !”५

जमखंडीच्या शाळेत १८९० साली इंग्रजी सहावीत असताना त्यांनी मित्रासमवेत स्कॉटचे ‘लेडी ऑफ द लेक’ हे काव्य आवडीने वाचले होते. त्यामध्ये वर्णन केलेले लॉख कॅट्रेन हे सरोवर त्यांनी साक्षात बघितले. जमखंडीमधील विद्यार्थिदशेतील तो काळ त्यांच्या स्मरणात पुनरुज्जीवित झाला. अंतःकरण भावनेने भरून आले. मुक्कामी गेल्यानंतर त्या वेळचे आपले वर्गमित्र जनार्दन सखाराम करंदीकर यांना एक सुंदर, काव्यात्म पत्र लिहिले. स्कॉच सरोवर प्रांतातील ह्या मुक्कामात एक दिवस ते ३, १९२ फूट उंचीचा बेन लोमंड हा पर्वत चढून गेले. क्वचित कोठे एखादे मेंढरू दिसे. वरून खाली नजर टाकल्यावर त्यांना अप्रतिम देखावा दिसत होता. २५ मैल लांब त्रिकोणाकृती लोमंड सरोवर क्लाईड नदीला जाऊन भिडले होते. जणू भले मोठे पिंपळाचे पान कोठून तरी तुटुन ह्या विस्तीर्ण प्रदेशात पडलेले आहे अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. कमालीचा एकांत, दुपारचे बारा वाजले होते, वारा वाहत नव्हता, थंडी वाजत नव्हती, उष्मा वाटत नव्हता. बाजूला तुटलेले कडे, वरती आकाशाचा घुमट, दूर नजर टाकली तर चाळीस मैलावरचा ग्लासगो शहरातला धूर आणि धुरळा दिसत होता. खाली लोमंड सरोवरावरून एखादी आगबोट केव्हातरी दुरून तरंगत असताना लहानशा हंसीसारखी दिसे. ह्या निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा लय लागला. समाधी म्हणावी अशा प्रकारचा अपूर्व एकतानतेचा अनुभव त्यांना आला.

निसर्गरम्य अशा स्कॉच सरोवर प्रांतामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकंदर नऊ दिवस वास्तव्य केले. टार्बेट, राऊडेंना ह्या ठिकाणी गरीब कुटुंबामध्ये झोपड्यात त्यांना राहण्यास जागा मिळाली. त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश फिरण्यास सापडले, शिवाय ‘हॉटेलात राहणा-या नागरिक लोकांचा संसर्गही थोडावेळ चुकविता आला’ हा त्यांना फायदाच वाटला. ह्या गरीब कुटुंबातील लहान मुलांचा सहवास त्यांना आवडला. शिंदे यांना निरागस लहान मुले निसर्गाचा भाग वाटत असत. त्यामुळे नेहमीप्रमाणे येथील लहान मुलांचा सहवास त्यांना आनंददायक वाटला. हा सरोवर प्रांत सोडण्याच्या आधी एक दिवस लॉख लोमंड सरोवरात त्यांनी स्नान केले. थंड पाण्यात, उघड्या हवेत परदेशामध्ये केलेले हे पहिले आणि अखेरचे स्नान.

२१ ऑगस्ट १९०२ रोजी रम्य अशा सरोवर प्रांताचा निरोप घेऊन वाटेत ग्लासगोला थोडे थांबून मँचेस्टर शहरी रात्री आठ वाजता ते पोहोचले. ती रात्र एका टेंपरन्स हॉटेलमध्ये काढली. दुस-या दिवशी मिस्टर होल्ट ह्या युनिटेरियन आचार्यांची भेट झाली. ह्या सात्त्विक गृहस्थाने बोलावल्यावरून मँचेस्टरमध्ये एक आठवडा त्यांच्याकडेच मुक्काम केला. यांचा चिटाचे छाप उठविण्याचा कारखाना होता.

मँचेस्टरपासून दहा-अकरा मैल दूर असलेल्या हेल् या गावी युनिटेरियन मंदिरामध्ये शिंदे यांनी सकाळ-संध्याकाळ दोन उपासना चालविल्या. मँचेस्टर येथील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणून ओवेन्स कॉलेज, रायलंड लायब्ररी आणि टेक्निकल स्कूल ही ठिकाणे पाहिली. कॉन्स्टन्स आणि एथेल ह्या होल्ट यांच्या दोन मुलींनी ही ठिकाणे त्यांना दाखविली. मँचेस्टर विलर्ट स्ट्रीट डोमेस्टिक मिशनचे युनिटेरियन मिशनरी रेव्ह. बिशप यांच्याबरोबर गलिच्छ वस्तीतील अत्यंत दरिद्री अशा आठ-दहा घरी ते गेले. कंगाल घरातदेखील भिंतीवर थोडीफार चित्र लावलेली असतात हे शिंदे यांच्या नजरेतून सुटत नसे. मात्र एकंदरीत यांची स्थिती त्यांना फार कंगाल दिसली. मिशनमध्ये शिंदे यांनी थोडा वेळ भाषण केले.

शिंदे यांना प्राथमिक शाळा, लहान मुलांच्या शाळा पाहण्याचा उत्साह होता. मँचेस्टर येथील किंडरगार्डन धर्तीची शाळा पाहण्यासाठी ते आवर्जून गेले. शाळेतील तरुण शिक्षिका त्यांना फार हुशार व उत्साही वाटल्या. शाळेत सुमारे ५०० मुले होती. त्यांना प्रत्यक्ष बाहुल्या दाखवून मातीची चित्रे करण्यास लावून, फुले व झाडे ह्यांची रंगीत चित्रे काढण्यास लावून शिकविण्याची पद्धती त्यांना फार आकर्षक वाटली. मँचेस्टरपासून पाच मैलांवर असेली एक दगडी खाण त्यांनी पाहिली. ही खाण जमिनीखाली ४४४ यार्ड खोल होती. आतमध्ये माणसे, घोडी, गाड्या काम करीत होती. हवा व प्रकाशाची सोय चांगली असल्याचे दिसून आले. मँचेस्टरसारख्या उद्योगी शहरात पृथ्वीच्या पोटातही कोणत्या प्रकारचा उद्योग चालतो हे शिंदे यांनी पाहून घेतले. या दगडी कोळशाच्या खाणीचे यथातथ्य व चटकदार वर्णन करणारा मुलांसाठी एक लेख लिहून त्यांनी तो सुबोधपत्रिकेला पाठविला.६

मँचेस्टरहून ते २८ ऑगस्टला लिव्हरपूल येथे आले. लिव्हरपूल डोमेस्टिक मिशनचे काम त्यांना पाहावयाचे होते. सगळ्या प्रवासामध्ये शिंदे यांनी डोमेस्टिक मिशनचे कंगाल वस्तीमध्ये चालणारे काम पाहणे हा एक उद्देश बाळगलेला दिसतो. रेव्ह. लॉईड जोन्स यांच्या घरी ते पाच दिवस राहिले. रविवारी संध्याकाळी डोमेस्टिक मिशनमध्ये उपासना चालविली. कंगाल वस्तीचे निरीक्षण केले व मिस्टर कॉक ह्या आपल्या मित्राकडे काही दिवस घालविण्यासाठी ते कॉर्नवॉल येथे गेले.

२७ सप्टेंबरच्या रविवारी क्रूकर्न येथील मंदिरात ‘हार्वेस्ट फेस्टिवल’ संबंधी सकाळी व संध्याकाळी वार्षिक उपासना चालविल्या. हा उत्सव शेतातील मळण घरी आणल्यावर ईश्वराचे आभार मानण्याप्रीत्यर्थ साजरा केला जात असतो. मंदिर फुले, फळे, रोपे इत्यादींनी अत्यंत कुशलतेने सजविले होते. लोकांमध्ये आदर, उत्साह व कळकळ दिसून आली. सकाळ व संध्याकाळच्या दोन्ही उपासनांना मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती. मिस्टर कॉक यांच्यासमवेत त्यांनी बॉस कॅसल येथील सुंदर समुद्रकिनारा पाहिला. टेनिसनने ‘एडिल्स ऑफ किंग’ ह्या काव्यात वर्णन केलेला समुद्रातील ऑर्थरचा किल्ला पाहिला. टर्नब्रिज वेल्स येथे मिस्टर जॉय यांच्याकडे चार दिवस मुक्काम करून ते ऑक्सफर्डला परतले. २ नोव्हेंबरला फ्रि चर्चमध्ये उपासना चालविण्यासाठी ते गेले. ब्राह्म समाजासंबंधी त्या वेळी शिंदे यांनी व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर एखा बाईने कलकत्ता येथील ब्राह्मो मुलींच्या शाळेच्या इमारत फंडासाठी एक पौंड दिला. ही रक्कम त्यांनी मिस्टर प्रिचर्डमार्फत कलकत्त्यास रवाना केली.

१९०२च्या ऑक्टोबरमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांची दुस-या वर्षाची पहिली टर्म सुरू झाली. फार्ले, इव्हर्ट, लॉकेट हे तिस-या वर्षांचे आणि बार्न्स, डॉट्रे, हँकीनसन, जोन्स आणि मिस् जी. व्हॉन पेटझोल्ड हे दुस-या वर्षाचे विद्यार्थी ह्या वर्षीही त्यांचे सहाध्यायी होते. जपानमधील झेड. टोयोसाकी हे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याप्रमाणेच  ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून आलेले खास विद्यार्थी या वर्षीही त्यांचे सहाध्यायी होते. मिस्टर जे. पार्क डेव्हिस, ऑर्थर गोलॅड, आलबर्ट थॉर्नहिल आणि सी. एम्. राइट हे ह्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतलेले विद्यार्थी नव्याने सहाध्यायी झालेले होते.७ शिंदे, टोयोसाकी हे बाहेरून आलेले विद्यार्थी इथल्या वातावरणाला रुळले होते. वर्षभराच्या सहवासाने सगळ्या विद्यार्थ्यांत चांगला मित्रभाव निर्माण झाला होता. शिंदे यांचा वर्गातला अभ्यास व बाहेरचे अवांतर वाचन उत्साहाने चालले होते. उपासनेमध्ये द्यावयाची व्याख्याने ते लिहून काढीत असत. ते हिंदुस्थानातून आलेले विद्यार्थी असल्यामुळे हिंतुस्थातील ब्राह्म धर्म या सुधारणावादी, उदारधर्म पंथाबद्दल त्यांच्याकडून ऐकायला मिळावे ही श्रोत्यांची अपेक्षा असे व ती ते पूर्ण करीत होते असे दिसते. कधी कधी ‘लौकिक व धार्मि जीवन’ सारख्या (वर्ल्डलीनेस अँड गॉडलिनेस) विषयांवर ते व्याख्यान देत असत. गेल्या सहा महिन्यांच्या अवधीत उपासना चालविण्याची त्यांना कितीतरी निमंत्रणे आली होती व ते ह्या उपासना आत्मविश्वाने चालवीत असत. त्यांच्या उपासना प्रभावी होत असत. त्यांचे धर्मचिंतन चालू होते. कधी सहाध्यायासमवेत तर कधी एकटे ते ध्यान करीत असत. मनाच्या वृत्तीनुसार घरात एकतारीवर भजन करीत असत. किंवा निसर्गात रम्य स्थळी एकांतामध्ये भक्तिपर पदे गात असत. त्यांचे धर्मशिक्षण आणि धर्मसाधन गंभीरपणे आणि मनासारखे चालले होते. त्यांच्या मनाला समाधान होते.

मँचेस्टर कॉलेजातील विद्यार्थी प्रौढ वयाचे, पदवीधर होऊनच येथे आलेले व पुढे धर्मोपदेशकाचे काम करणारे असे होते. मात्र ते नेहमीच गंभीरपणाने वागत असत असे मात्र नव्हे. ते बहुतेक खेळकर वृत्तीने वागत. तर कधी कधी लहान मुलांप्रमाणे व्रात्यपणा करीत. दंगा करीत.

जपानमधून आलेले टोयोसाकी हे उंचीने ठेंगू आणि वृत्तीने गमती होते. इतर विद्यार्थीही त्यांची चेष्टा करीत. ते कॉलेजच्या वसतिगृहातच राहत होते. एकदा अशी टूम निघाली की, सर्वांची उंची मोजावी. टोयोसाकील एका भिंतीजवळ उभा केले. त्याच्या उंचीची रेघ मारण्याच्या मिषाने हात वर करून वर आलेली पाण्याची तोटी खुली केली. टोयो दचकून निसटला व सर्वत्र हशा पिकला. दर रविवारी टोयो लाँग कोट, टॉप हॅट असा फार सभ्यतेचा पोशाख करून शहरातील मुख्य मुख्य रस्त्याने हिंडून येई. एकदा त्याच्या सोबत्यांनी त्याच्या पाठीवर कोटाल ‘चेस मी गर्ल्स’ असे जाड अक्षरात लिहिलेली कागदाची चिठ्ठी लावली. नेहमीप्रमाणे ऑक्सफर्डमधील प्रमुख शहराची फेरी मारून स्वारी परत आली तरी त्याला ह्या गोष्टीचा पत्ताच नव्हता, हे पाहून मोठाच हशा पिकला.

कॉलेजच्या इमारतीत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कॉमन रूममध्ये सिगरेटी फुंकणे, खिदळणे हे विद्यार्थ्यांचे प्रकार मनसोक्त चालत. विठ्ठल शिंदे हे इतरांसारखे खिदळत नसल्याने त्यांना ‘मीक इंडियन’ म्हणजे ‘मलूल हिंदी’ असे म्हणत असत. त्यांचा निरुपद्रवीपणा हाच बाकीच्यांना जणून उपद्रव देत होता. म्हणून त्यांची चेष्टा करण्यासाठी एकदा त्यांना गोल मेजावर निजवून काहींनी घाण्यासारखे गोल फिरवले. एकदा तर वर्गात प्रोफेसर ड्रमंड यांचे व्याख्यान चालून असता इव्हर्ट ह्या स्कॉच विद्यार्थ्याने भलताच खोडकरपणा केला. शिंदे फेटा बांधून त्याचा शेमला सोडून वर्गात गेले होते. इव्हर्टने त्यांच्य मागे बसून शेमल्याचे टोक हळूहळू खेचायला सुरुवात केली. शेवटी त्यांच्या डोक्याला फेट्याचा फक्त एक विळखा राहिला. सगळा वर्ग तर हसू लागलाच पण, प्रिन्सिपॉल ड्रमंड यांनाही तिकडे न पाहिलेसे करून व्याख्यान चालविणे जड जाऊ लागले.

सिगरेट न ओढणारे विद्यार्थी फक्त शिंदे. त्यांची बसावयाची खोली स्वच्छ व टापटिपीची असे. हा अपराध कॉलेजबंधूंच्या दृष्टीने असह्य होता. एकदा त्यांच्याकडे चार-पाच वर्गबंधू चहासाठी न बोलावता आले. बरोबर सगळ्यांनी सिगारेटचे डबे आणले होते व प्रत्येकजण धुराचे लोळच्या लोळ सोडू लागला. लँडलेडी जेव्हा चहा द्यायला खोलीकडे आली तेव्हा आग लागली की काय या भयाने तिने किंकाळीच फोडली.
गंभीरपणे धर्मशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या स्वभावाची ही दुसरी बाजू होती!

आतापर्यंतची प्रत्येक सुटी नवीन प्रदेश, नवी ठिकाणे, वेगवेगळी शहरे पाहण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे खर्च करीत आले होते. इंग्लंड, स्कॉटलंडमधील बहुतेक रम्य प्रदेश व प्रेक्षणीय स्थळे त्यांनी बघून घेतली होती. म्हणून १९०२च्या डिसेंबरमधील नाताळची सुटी ऑक्सफर्डमध्येच लेखन-वाचनात घालवायची असे त्यांनी ठरविले.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ११८-११९. आठवड्यानंतर शिंदे पुन्हा एकदा ब्लॅकफर्ड हिलवर फिरावयाला गेले असता तेथे एक पोलीस त्यांना आढळला. सार्वजनिक ठिकाणी घडू नये तो प्रकार घडत असल्यास त्याचा प्रतिबंध करण्याचे काम त्याजकडे होते असे चौकशीअंती त्यांना समजले. प्रस्तुत लेखक ऑक्टोबर १९८३ मध्ये तेथे गेला असता पोलिसांची ही व्यवस्था अद्याप चालू असल्याचे गस्त घालणा-या फिरत्या गाडीतील पोलीस अधिका-याने त्यांना सांगितले.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १७३.
३.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. १२०. येथे उल्लेखिलेले भाटे म्हणजे प्रा. गणेश सदाशिव भाटे (१८८०-१९२७) होत. ते इंग्लंडमध्ये आय्. सी. एस्. होण्यासाठी गेले होते. त्यांना त्या परीक्षेत यश मिळाले नाही. नंतर त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची एम्. ए. ची पदवी संपादन केली. बडोदा संस्थानात मुलकी अधिकारी व त्यानंतर भारत सरकारच्या शिक्षणखात्यात प्राध्यापक म्हणून काम. मराठीत समीक्षालेखन. नृत्यविशारद रोहिणी भाटे यांचे ते वडिल. (संदर्भ-(संपा.) वसंत पाटणकर, ग. स. भाटेः एक वाङ्मयसमीक्षक, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई व प्रतीमा प्रकाशन, पुणे, १९९५.)
४.    शिंदे यांनी रोजनिशीत उल्लेखिलेले हे सार्वजनिक वाचनालय म्हणजे एडिंबरो येथील जॉर्ज फोर्थ ब्रिजजवळ असलेली एडिंबरो सेन्ट्रल लायब्ररी होय. प्रस्तुत लेखकाने हे ग्रंथालय ऑक्टोबर १९८३ मध्ये ग्रंथालयामध्ये एडिंबरोबद्दलची सर्व माहिती मिळेल. अशी एक एडिंबरो रूम असून प्रस्तुत लायब्ररीची सर्वांगीण माहिती देणारा प्रबंधही तेथे उपलब्ध होता.
५.    सुबोधप्रत्रिका, १ फेब्रुवारी १९०३.
६.    तत्रैव, १८ जानेवारी १९०३.
७.    मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड, अन्युअल रिपोर्टस्, १९०४-१९१८.

  1. एकेश्वरी उदार धर्मपंथ
  2. उपसंहार
  3. इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष
  4. आजी-आजोबा आणि आई-वडिल
  • 119
  • 120
  • 121
  • 122
  • 123
  • 124
  • 125
  • 126
  • 127
  • 128
Page 124 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी