1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

एकेश्वरी उदार धर्मपंथ

विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली ती मोठ्या गांभीर्याने. १८९८ मध्ये त्यांनी रोजनिशीत लिहिलेल्या काही नोंदींवरून ते धर्माकडे किती गंभीरपणाने पाहत होते हे ध्यानात येतेच. ह्या दीक्षेच्या वेळेपासून ब्राह्मधर्माचा आणि त्यांचा आयुष्यभरचा अतूट संबंध जडला. ब्राह्मधर्माचे आपण केवळ एक अनुयायी होऊन आयुष्य घालविणे ह्यात त्यांच्या मनाचे समाधान होणार नव्हते. धर्मप्रचारक या नात्याने आपले आयुष्यच ह्या उन्नत धर्मकार्यासाठी वाहावे अशी त्यांच्या मनाची धारणा होत चालली होती असे त्यांचे मित्र जनुभाऊ करंदीकर यांच्या अभिप्रायावरून दिसून येते.१ विठ्ठलराव १८९९ मध्ये मुंबईस कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेले  असताना पुणे प्रार्थनासमाजाच्या तसेच मुंबई प्रार्थनासमाजाच्या पीठावरून उपासना चालवू लागले होते. त्यांचे मन ज्या उन्नत स्वरूपाच्या एकेश्वरी उदारमतवादी धर्मपंथाकडे आकृष्ट झाले, त्या विश्वधर्माचे हिंदुस्थानाबाहेर व हिंदुस्थानात काय स्वरूप होते हे ऐतिहासिक व तात्त्विकदृष्ट्या ध्यानात घेऊ.

हिंदुस्थानमधे ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज हे एकेश्वरी धर्मपंथ हिंदू धर्मातून विकास पावून एकोणिसाव्या शतकापासून कार्य करू लागले, तर इंग्लंड व अमेरिका ह्या देशांमध्ये सार्वत्रिक स्वरूपाच्या धर्माचे कार्य करणारा, ख्रिस्ती धर्मामधून विकास पावलेला युनिटेरियन या नावाने ओळखला जाणारा धर्मपंथ युरोपमध्ये सोळाव्या शतकामध्ये उद्याला आला. आधुनिक शास्त्र, तत्त्वज्ञान व विचारपद्धती यांच्याशी विरोध येऊ न देता, किंबहुना आधुनिकता आत्मसात करून धर्मकार्य करीत राहणे हे या धर्मपंथांचे वैशिष्ट्य आहे.

युनिटेरियन धर्मपंथ
सोळाव्या शतकात ख्रिस्ती धर्मात मोठी सुधारणा झाल्यानंतर युनिटेरियन हे नाव प्रचारात आले. युनिटेरियन ह्या इंग्रजी पदाचा अर्थ एकवादी असा आहे. ख्रिस्ती धर्मातील त्रयवादाच्या संदर्भात ह्या संज्ञेचा अर्थ समजून घ्यावा लागतो. पारंपरिक ख्रिस्ती धर्मसिद्धान्तानुसार देव एकच आहे, पण त्याचे स्वरूप त्रिविध आहे. पिता असलेला देव, पुत्र असलेला देव (प्रभू येशू ख्रिस्त) आणि पवित्र चैतन्य. पण देव म्हणजे ह्या तीन भिन्न व्यक्ती असल्या तरी देव म्हणजे ह्या तीन भिन्न व्यक्तींचे त्रिकूट नाही, समुदाय नाही. ह्या तीन्ही व्यक्तींचे सत्त्व एकच आहे. हा सिद्धान्त म्हणजे देवाच्या त्रित्वाचा (Trinity) सिद्धान्त२ अथवा त्रयवाद होय. ह्या सिद्धान्तानुसार पित्याच्या स्वरूपातील देव हा आपला निर्माणकर्ता आहे, पुत्राच्या स्वरूपातील देव म्हणजेच येशू ख्रिस्त हा आपला तारणकर्ता आहे व पवित्र आत्माच्या स्वरूपातील देव ऊर्फ चैतन्य ही आपली शक्ती आहे.३

ह्या त्रयवादावर (Trinity) विश्वास असणे म्हणजे ख्रिस्ती असणे असे कडव्या ख्रिस्ती लोकांचे मत असते. ह्या मताच्या उलट युनिटेरियन लोक परमेश्वर सर्वतोपरी एकच आहे व ख्रिस्त हा केवळ अति पवित्र साधुपुरुष पण इतरांसारखा मनुष्य होता असे समजतात. त्रयवादाचा सिद्धान्त ख्रिस्तानंतर तीनशे वर्षांनी निर्माण झाला. सेंट पॉलने ख्रिस्ताची शिकवण यथार्थ स्वरूपात प्रसृत करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तरीही ख्रिस्तानंतरच्या तीन शतकांमध्ये ख्रिस्त आणि त्याची शिकवण ह्याबद्दल अनेक परस्परविरोधी मते व पंथ निर्माण होऊन मतमतांचा गलबला निर्माण झाला.

कॉन्स्टॅन्टाइनच्या युरोपियन बादशहाने इ. स. ३२५ मध्ये नायसिया येथे मोठी धर्मपरिषद बोलावली. तीमध्ये धर्माधिका-यांनी अर्धा वाद व अर्धी जबरी करून त्रयवाद स्थापन केला. तदनंतर रोमच्या मठाचा अधिकार वाढून धर्माचे अधिकार व युरोपच्या राज्यसत्तेवरचे नियंत्रण पोपच्या हाती आले. पुढील एक हजार वर्षांच्या युरोपच्या इतिहासातील या अंधारी युगामध्ये तीच ती धर्ममते, सामाजिक कृत्रिम बंधने व व्यक्तींचे आचार अव्याहत चालू राहिले.

सोळाव्या शतकात मार्टिन लूथर (१४८३-१५४६) आणि जॉन कॅलव्हिन (१५०९-१५६४) ह्या कर्तबगार धर्मसुधारकांचा उदय झाला. त्यांनी पोपचे प्रामाण्य, त्यांच्या हस्तकांचा जुलूम, प्रायश्चित्तांचा बाजार वगैरे अनेक अधार्मिक बाबींविरुद्ध धर्मयुद्ध करून युरोपचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. मात्र लूथर अथवा कॅलव्हिन हे पूर्ण सुधारक नव्हते. चौथ्या-पाचव्या शतकातील कॅथॉलिक धर्ममताचे नमुने त्यांनी जसेच्या तसे पत्करले होते. मात्र धर्माच्या बाबतीत स्वतंत्र विचारांची जी लाट त्यांच्यामुळे सुरू झाली ती तशीच पुढे पुढे सरकत गेली. त्यांनी साधुसंतांच्या मूर्तीची पूजा बंद केली. प्रायश्चत्ते विकण्याची चाल बंद केली. बायबलचीसुद्धा नवीन आवृत्ती काढली. ह्यानंतरही काही विचारी माणसे प्रश्न करीत राहिली, ख्रिस्त हा मनुष्य की देव? केवळ त्याच्या विश्वास ठेवल्याने मोक्ष मिळतो की सत्कर्म केल्याने मिळतो? मनुष्यप्राणि जन्मतःच पापी आहे काय? काही आत्म्यांस गती व काहींस अधोगती ही निवडानिवड देवाने आधीच केली आहे हे खरे काय? इत्यादी प्रश्नांसंबंधी पुन्हा विचार सुरू झाला. लूथर आणि कॅलव्हिन हे या बाबतीत जुन्या मताचे दुराग्रही होते. सर्व्हिट्स नावाच्या एका स्पॅनिश डॉक्टरला ‘ख्रिस्ती धर्माचा उद्धार’ ह्या नावाचा स्वतंत्र विचाराचा ग्रंथ लिहिल्याबद्दल पाखंडी ठरवून कॅलव्हिन ह्याने इ.स. १५५३ मध्ये जिवंत जाळायला लावले. सर्व्हिट्स हा नाव घेण्याजोगा पहिला युनिटेरियन होय.

पोलंडमध्ये सेजिस्मंड हा उदार मताचा राजा असल्यामुळे व त्याने धर्माबाबतीत स्वातंत्र्य दिल्यामुळे ब्लँडॉटा या इटालियन वैद्याने इ. स. १५६५ मध्ये पहिला युनिटेरियन समाज स्थापन केला पोलंडच्या शेजारच्या ट्रान्सिस्ल्व्हानिया, हंगेरी ह्या देशांतही ह्या मताचा झपाट्याने प्रसार सुरू होऊन सुमारे साडेचारशे समाज स्थापिले गेले. उदारमतवादी सेजिस्मंड राजाच्या कारकिर्दीनंतर कॅथॉलिकांची सत्ता सुरू झाली व लूथर व कॅलव्हिन यांच्या अनुयायांनी तसेच कॅथॉलिक राज्यकर्त्याने युनिटेरियनांचा छळ चालविला. इंग्लंडातील युनिटेरियनांच्या मदतीने ते तग धरून राहिले व नंतर हळूहळू वाढत गेले. सोळाव्या व सतराव्या शतकात इंग्लंमध्ये सनातन ख्रिश्चन धर्ममतातील कल्पनांना विरोध केल्याबद्दल दोन-तीन जणांना जिवंत जाळले गेले. परंतु युनिटेरियन मताचा प्रभाव वाढत राहिला. पोलंडातील युनिटेरियन पुस्तके आणून इंग्लंडात छापून त्याचा प्रसार करण्यात येत होता. रीतसर समाजाची स्थापना झाली नव्हती तरी त्या काळातील मिल्टन, लॉक, न्यूटन ह्यांसारखे कवी, विचारवंत व शास्त्रज्ञ युनिटेरियन मताचे बनले होते.

सोळाव्या शतकात इंग्लंडात प्रॉटेस्टंट धर्माची स्थापना झाली तरी स्वतंत्र रीतीने विचार व उपासना करण्याची सोय नव्हती. राष्ट्रात प्रचलित असणा-या धर्माचे आचरण न करता त्याच्या विरोधात जाणा-यांना नॉनकन्फॉर्मिस्ट किंवा डिसेंटर्स म्हणण्यात येऊ लागले. १६८८ मध्ये इंग्लंडचा स्ट्युअर्ट राजा दुसरा जेम्स याला काढून विल्यम ऑरेंजला सिंहासनावर बसविले. ह्या राज्यक्रांतीमुळे राज्यसत्ता ईश्वरदत्त असते या कल्पनेला तडा गेला. पार्लमेंट सार्वभौम झाले. इंग्लंड हे लोकशाहीनिष्ठ राष्ट्र झाले. ह्याचा स्वाभाविक परिणाम धर्मक्षेत्रावरही झाला. सर्व लोकांना उपासनास्वातंत्र्य मिळाले. प्रेस्बिटर शाखेच्या लोकांनी आपली स्वतंत्र मंदिरे बांधली व त्यांमध्ये उपदेश करणा-या लोकांवर कोणत्याच धर्ममताचे बंधन ठेवले नाही. त्यामधून युनिटेरियन मताचा स्वतंत्र विचार झपाट्याने होऊ लागला. सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टले याने युनिटेरियन मताचा राजरोसपणे पुरस्कार सुरू केला. यार्कशायरमधील एक धर्मप्रचारक थिओफिल्स लिंडसे याने आपले मिळकतीचे आचार्यपद सोडले आणि लंडन येथील एसेक्स स्ट्रीटमध्ये उपदेश करण्यासाठी एक जुनी लिलाव करण्याची जागा स्वतःच्या खर्चाने भाड्याने घेतली व अशा प्रकारे सन १७७३ मध्ये इंग्लंडात प्रथम युनिटेरियन समाजाची उघडपणे स्थापन झाली. (ह्या जागेवरच अद्यापि युनिटेरियन पंथाचे कार्य चालू आहे.) इ.स. १७८६ मध्ये कोणतीही मतासंबंधी अट न घालता धर्माचे स्वतंत्र शिक्षण देण्यासाठी व उपदेशक आणि प्रचारक तयार करण्यासाठी मॅंचेस्टर कॉलेजची स्थापना झाली. चोहीकडे देशात युनिटेरियन समाज निघू लागले. इ. स. १८२५ मध्ये इंग्लंडात व बाहेर युनिटेरियन मतांचा प्रसार करण्यासाठी ‘ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशन’ नावाची मंडळी स्थापन करण्यात आली.

अमेरिकेत त्या मानाने मोकळे वातावरण होते. १७८५ मध्ये बॉस्टन येथील एका समाजाने उघडपणे युनि़टेरियन मत स्वीकारले. इकडे इंग्लंडात डॉ. प्रिस्टले यांचा पारंपरिक ख्रिस्ती मताच्या लोकांनी फार छळ सुरू केला होता. बर्मिंगहॅम येथील त्यांचे घर जाळले. लंडन येथेही त्यांना सुखाने राहू दिले नाही म्हणून या त्रासाला कंटाळून ते अमेरिकेत गेले. तेथील लोकांनी त्यांचा बहुमान केला व त्यांच्यामुळे युनिटेरियन मताचा प्रसार होण्याला मोठी मदत झाली. पुढे लाँगफेलो, लोवेल वगैरे कवी; इमर्सनसारखे लेखक व थि़ऑडर पार्करसारखे उपदेशक ह्यांनी युनिटेरियन मत देशभर पसरविले.

प्रारंभीच्या काळातील डॉ. प्रिस्टले व लिंडसेप्रभृती युनिटेरियन व नंतरच्या काळातील डॉ. मार्टिनो, रे. आर्मस्ट्राँग यांच्यासारखे युनिटेरियन यांच्यासारख्यांच्या विचारात महदंत पडले आहे. प्रिस्टले इत्यादिकांना ख्रिस्ताचे देवत्व व धर्मातील अन्य दुराग्रही मते मान्य नव्हती. मात्र ख्रिस्ती धर्म म्हणजे एक अप्रतिम ईश्वरी सत्य आहे असे त्यांना वाटत होते. हल्लीच्या काळात कोणताही युनिटेरियन बायबलचा अनादर करीत नसला तरी बायबलवर शंभर टक्के  विश्वास ठेवीत नाही. बायबलची तो चिकित्सा करतो. धर्म ही बाब शाब्द चिकित्सेची नव्हे. केवळ मानसिक विश्वासाचीही नव्हे. तर ती अंतःकरणाच्या उच्च भावनांची आहे अशी त्यांची दृढ समजूत होऊ लागली आहे. हल्लीचा युनिटेरियन समाज म्हणजे सुधारलेल्या पाश्चात्य जगाचे ‘प्रबुद्ध अंतर्याम’ (Enlightened Conscience) होय.४

युरोपात एकोणिसाव्या शतकात मानवी विचाराची व शोधाची ज्ञानमार्गामध्ये जी अभूतपूर्व प्रगती झाली तिचे फळ म्हणून युनिटेरियन धर्मपंथाला विसाव्या शतकाच्या आरंभी उदार व प्रगत रूप प्राप्त झाले. ही विचाराची गती चार निरनिराळ्या दिशांनी प्राप्त झाली, असे ह्या प्रक्रियेचे विठ्ठल रामजी शिंदे विवरण करतात. १) अनुभवजन्य शास्त्राच्या विकासाला प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वी झाला असला तरी एकोणिसाव्या शतकात या शास्त्रांनी तात्त्विक दिशा घेतली आणि डार्विन व स्पेन्सर यांनी उत्क्रांती तत्त्वाची पटावी अशी मांडणी केली. २) अनुभवजन्य ज्ञानाबरोबरच जर्मनीत तत्त्वज्ञानाच्या पातळीवर विकास साधला गेला. कांट, हेगेल व त्यांच्या अनुयायांनी असा सिद्धान्त स्थापन केला की, विश्वातील भौतिक, मानसिक व नैतिक चमत्काराच्या मुळाशी एकाच स्वयंसिद्ध शक्तीचे कार्य अबाधितपणे चालू आहे. ३) शास्त्र व तत्त्वज्ञान यांच्या अभ्युद्यामुळे धर्माच्या ईश्वरप्रणीत त्त्वावर आघात. बायबलच्या जुन्या व नव्या कराराची निरनिराळी प्रकरणे कोणी, कधी, कशा स्थितीत लिहिली, त्यात ऐतिहासिक भाग किती व निव्वळ कल्पित भाग किती वगैरे गोष्टींची स्ट्रॉस, बॉवर, प्लीडरर इत्यादिकांनी निःपक्षपातीपणे चिकित्सा सुरू केली. ४) आणखी महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे तुलनात्मक धर्मशास्त्राचा. युरोपमध्ये संस्कृतवरून अनेक नव्या व जुन्या भाषांचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाल्यापासून जगातील प्रमुख धर्मग्रमथांचे मूळ भाषेतून अध्ययन, संशोधन होऊ लागले. त्याचप्रमाणे धर्माचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाला. एवढेच नव्हे तर ख्रिस्त शतकापूर्वी तीन-चार हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या असीरियन, बाबिलोनियन, इजिप्शिअन संस्कृतीमधील धार्मिक शिलालेख उपलब्ध करून त्यांची मीमांसा सुरू झाली.
 
इतक्या विस्तृत प्रमाणावरून धर्मशास्त्राच्या नविन इमारतीचा पाया घातला गेला. ह्या प्रकारे शास्त्र, तत्त्वज्ञान, मीमांसा व इतिहास ह्या चारी बाजूंनी विचार करता हाच सिद्धान्त स्थापन झाला की, रानटी अवस्थेतील मानवी आत्म्यात प्रथम जागृती झाल्यापासून आतापर्यंत धर्मबुद्धीचा सारखा विकास होत आहे. ह्या चारही प्रकारे झालेल्या वैचारिक मंथनातून युनिटेरियन धर्मविचाराला सध्याचे विवेकशील स्वरूप प्राप्त झाले आहे. युनिटेरियनांमध्ये बुद्धिवाद जास्त व भक्ती कमी असा जो आक्षेप घेतला जातो तो रास्त नाही. बुद्धिवादाच्या संदर्भात असे म्हणता येईल की, बुद्धीला अग्राह्य वाटणा-या व आत्म्याच्या बुद्धीला केवळ अनावश्यक अशा गोष्टींत जिथे जुन लोक आग्रह धरतात तेथे युनिटेरियन उदासीन असतात. म्हणून युनिटेरियन सामान्यः नकारात्मक भूमिकेवरून बुद्धिवादाचा जितका उपयोग करतो तितका भावरूपत्वाने करीत नाही. म्हणून ईश्वराचे गुण, त्याचे व्यापार, त्याचे केवल स्वरूप, मानवी आत्म्याची मागील व पुढील स्थिती इत्यादी अनाकलनीय गोष्टीसंबंधाने युनिटेरियन आपले ठाम मत बनविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. युनिटेरियनांचा बुद्धिवाद हा विचाराचा हटवाद, कृतीचे ढोंग आणि अंध परंपरा ह्यांचा निषेध करतो आणि विचाराची अश्रद्धता, मताचे औदासीन्य व कृतीचा निरूत्साह ह्यावर आपले विधिरूप अस्त्र सोडतो. विचाराचे पूर्ण स्वातंत्र्य आणि उपासनेचा सोहळा युनिटेरियन देवळात नित्य घडत असतो. त्यांच्या ठायी उत्कट भक्ती वसत असते. युनिटेरियन धर्मपंथाचे आजचे स्वरूप आहे ते या प्रकारचे.

ब्राह्मसमाज
पाश्चात्त्य जगात ज्याप्रमाणे ख्रिश्चन धर्मातून युनिटेरियन धर्मपंथ उत्क्रांत झाला त्याप्रमाणे हिंदुस्थानात पारंपरिक हिंदू धर्मातून ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज हे एकेश्वरवादी धर्मपंथ उत्क्रांत स्वरूपामध्ये निर्माण झाले. पाश्चात्त्य जगातील ख्रिश्चन धर्म व हिंदू धर्म यांच्या स्वरूपामध्ये मात्र मोठा फरक आहे. हिंदुस्थानामध्ये पूर्वीच्या काळात व सध्याच्या काळातही विशिष्ट आणि ठरावीक मताविषयी फारसा आग्रह आढळून येत नाही. काही धर्मग्रंथ पूज्य मानण्यात येत असले तरी बायबल किंवा कुराणासारखा एकच एक धर्मग्रंथ निखालस प्रमाण मानला जात नाही. ज्याला हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी मानण्यात येते ते ग्रंथ संस्कृतात असल्यामुळे धर्मवेत्ते त्याचे वेगवेगळेच नव्हे तर परस्परविरोधी अर्थ काढताना दिसतात. त्यामुळे सामान्य माणसाच्या धर्ममार्गात धर्मग्रंथाचा फारसा अडथळा येत नाही. उपासनेचा प्रकार हा सगळ्या हिंदूंत येथून तेथून सारखाच आढळत नाही. ती सामान्यतः स्थानिक बाब असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक घरात पूजनीय देवांच्या प्रतिमांताचा देव्हारा सजविलेला असतो. त्यामुळे हिंदू धर्माची संघसंस्था ऊर्फ चर्च कधीच बनले नाही. हिंदू धर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातींचा एक मोठा व्यूह बनलेला आहे त्याच्याव्दारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर आधारलेला आहे. आठव्या शतकाच्या सुमारास येथे पहिले मोठे आचार्यपद स्थापण्यात आले. परंतु त्याची कामगिरीही लोकांच्या आध्यात्मिक गरजा समजून घेऊन भागविण्याची नसून केवळ जातिबंधनाच्या व्दारा हिंदू धर्माच्या जुन्या समजुती आणि विधी ह्यांची परंपरा शाबूत ठेवणे एवढीच आहे. हिंदुस्थानात खरे जुलमी साम्राज्य चालते ते आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कुणाचेही नसून ते फक्त चालू वहिवाटीचे चालते. बाहेरून आलेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्माचा रूढ हिंदू धर्मावर फारसा परिणाम झाला नाही.५

आधुनिक काळात भारतामध्ये घडलेला धर्मसुधारणेचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे राजा राममोहन रॉय यांनी १८२८ मध्ये स्थापन केलेला ‘ब्राम्ह्यसमाज’ हा होय. आधुनिक भारताची घडण करणा-या श्रेष्ठ आद्य पुरुषांपैकी राजा राममोहन रॉय हे होत. सतीची चाल बंद करणे हे राजा राममोहन रॉय यांचे भारतीय पातळीवरील सामाजिक स्वरूपाचे महत्त्वाचे कार्य होय. त्याशिवाय  इंग्रजी शिक्षण, संस्कृत शिक्षण, स्त्रियांची सुधारणा, जातिनिर्मूलनाचे प्रयत्न इत्यादी सुधारणांना त्यांनी हात घातला. इंग्रज सरकारशी विरोध आणि सहकार्य अशी दुहेरी भूमिका ठेवू्न भारतीय जनतेचे अनेक अंगांनी कल्याण साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक, शैक्षणिक सुधारणाविषयक कार्य त्यांनी केले असले तरी त्या सगळ्यांचा पाया धर्म हा होता. विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे, “त्याचा धर्म म्हणजे केवळ एक मत किंवा मनोवृत्ती नसे तर साक्षात जीवन होता व ते जीवन ही सर्व बाजूंचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युदय, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठी त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली.”६

राजा राममोहन रॉय यांनी अरेबिक भाषेचा अभ्यास केला व कुराण मुळातून वाचले. त्यांनी संस्कृत भाषेचाही चांगला अभ्यास केला. चोविसाव्या वर्षी इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात करून तीमध्ये पारंगतता मिळविली. जगातील महत्त्वाच्या धर्मग्रंथांचा मूळ ग्रंथांच्या आधारे त्यांनी अभ्यास केल्यामुळे त्यांची धर्मकल्पना व्यापक, उदार व पूर्वग्रहरहित अशी झाली. राजा राममोहन रॉय हा तुलनात्मक धर्मशास्त्राचा जगातला पहिला संशोधक होय, असे सर मॉनियर वुइल्यम्स यांनी म्हटले आहे. मूर्तिपूजेमुळे प्रचलित हिंदू धर्मामध्ये किती अनर्थ होत आहेत याची त्यांना जाणीव झाली. रूढ हिंदू धर्माच्या नावाखाली कित्येक अनाचार माजले होते. दुर्गापूजेच्या निमित्ताने किळसवाणा हिंसाचार चालू होता. अघोरी पंथाचे भयंकर प्रकार धर्माच्या नावाखाली चालू होते. नीतिबंधने ढिली झाली होती. व्यसनासक्ती वाढली होती. एकंदरीत समाजाची नैतिक पातळी खालावली होती. अशा कळात राजा राममोहन रायांनी मुळातील हिंदू धर्माचे उज्ज्वल रूप ध्यानात घेऊन ब्राम्ह्यमताची मांडणी केली व १८२८ मध्ये ब्राह्मसमाजाची स्थापना केली. परमेश्वर एक आहे; आम्ही सर्व त्याची बालके आहोत; आम्हामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राखण्याची आवश्यकता नाही; परमेश्वराचे मानसिक भजन, पूजन करणे हाच त्याच्या भक्तीचा योग्य मार्ग आहे, ही ब्राम्ह्यसमाजाची तत्त्वे म्हणून त्यांनी उद्घोषित केली. राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्ह्य मंदिराच्या ट्रस्टडीडमध्ये भेद न करण्याच्या तत्त्वाला प्राधान्य दिले आहे. त्यात म्हटले आहे, “सनातन ईश्वराच्या उपासनेकरिता कोणताही भेद न राखता सर्वांनी जमण्याची जागा.” तसेच “परमेश्वर अचिन्त्य, विश्वाचा कर्ता आणि भर्ता व कोणत्याही विशिष्ट नावाने न ओळखला जाणारा” असे वर्णन केले आहे. सत्य, न्याय आणि सहिष्णुता यांची बूज राजा राममोहन रॉय यांनी ट्रस्टडीडमध्ये राखलेली आढळते. अन्य कुणाचेही उपास्य दैवत झालेल्या जिवंत अथवा जड वस्तूची ब्राह्मोपासनेत कोणत्याही प्रकारे निंदा अथवा थट्टा करू नये, असे नमूद केले आहे. राजा राममोहन रॉय यांना ब्राह्मसमाजाच्या कार्याचा विस्तार करावयाला अवधी मिळाला नाही. समाजाची स्थापना केल्यावर दोन वर्षांनी म्हणजे १८३० मध्ये ते विलायतेस गेले व तिकडेच वारले. राजा राममोहन रॉय यांच्या नंतरचे प्रमुख आचार्य पंडित विद्यावागीश यांचा देवेंद्रनाथ ठाकूरांना परिचय झाला. देवेंद्रनाथ ठाकूर यांचा धर्मचिंतनाकडे ओढा सुरू झालेला होता. प्रतिमापूजनावरील त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. उपनिषदातील धर्मविचाराकडे ते आकृष्ट झाले होते. उपनिषदामधील तत्त्वांची चर्चा करण्याच्या व बोध करण्याच्या हेतूने १८३९ मध्ये ‘तत्त्वबोधिनी सभा’ नावात एक संस्था त्यांनी स्थापन केली व संस्कृत भाषेतील उपनिषदामधील विचार सर्वसामान्य लोकांना बंगाली भाषेतून कळावा यासाठी तत्त्वबोधिनी पत्रिकाही काढली.

१८४१-४२ च्या सुमारास महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर ब्राह्मसमाजात दाखल झाले व वृद्ध पंडित विद्यावागीश यांनी ब्राह्मसमाजाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. देवेंद्रनाथांनी उपनिषदांतील तत्त्वविचारांच्या आधारे ब्राह्ममताची मांडणी केली. देवेंद्रप्रणीत ब्राह्मसमाजाला ‘आदि ब्राह्मसमाज’ असे अभिधान मिळाले. ‘आदि ब्राह्मसमाजा’ची तत्त्वे पुढीलप्रमाणे मांडण्यात आली :

१. प्रथम फक्त एक परब्रह्म परमेश्वर होता दुसरे काही नव्हते. त्यानेच सर्व सृष्टी उत्पन्न केली आहे.
२. तो ज्ञानस्वरूप, अनंतस्वरूप, मंगलस्वरूप, नित्य, नियंता, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वाश्रय, निरवयव, निर्विकार, एकमेवाद्वितीय, सर्वशक्तिमान, स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. त्याच्याशी कुणाचीही तुलना करता येत नाही.

३. फक्त त्याचीच उपासना केल्याच्या योगे इहपरलोकी सुख प्राप्त होते.

४. त्याच्यावर प्रीती करणे व त्याला प्रिय अशी कार्ये करणे हीच त्याची खरी उपासना.

१८५७ मध्ये केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मसमाजामध्ये प्रवेश केला. केशवचंद्र सेन यांची आध्यात्मिक तळमळ व ब्राह्मसमाजाला नेतृत्व देण्याची क्षमता ध्यानात घेऊन महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांनी १८६२ मध्ये त्यांची आचार्यपदी स्थापना केली. हे आचार्यपद त्यांनी १८७८ पर्यंत सांभाळले. ह्या अवधीत ब्राह्मसमाजाच्या कार्याचा त्यांनी अपूर्व विस्तार केला. बारा ठिकाणी ब्राह्मसमाजाच्या शाखा होत्या. केशवचंद्रांनी पुढील पंधरा वर्षांत हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत व भाषांमध्ये शाखा स्थापन केल्या. थोड्या सुशिक्षित लोकांपुरत्या मर्यादित असलेल्या ब्राह्मसमाजाचा केशवचंद्रांनी आबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष व स्वकीय-परकीय यांमध्ये प्रसार केला. केशवचंद्र सेन यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने केवळ भारतातच नव्हे तर इंग्लंडमधील विद्वान राज्यकर्ते व सामान्य लोक यांच्यावरही दांडगा प्रभाव पाडला. १८७१ मध्ये विलायतेहून परत आल्यानंतर ब्राह्म धर्मप्रचाराच्या जोडीनेच समाजसुधारणेचे कार्यही त्यांनी धडाडीने सुरू केले. स्वस्त वाङ्मय, स्त्रीविमोचन, लौकिकशिक्षण, मद्यपानबंदी व अपंगांची सेवा ह्या पंचसूत्रीच्या अनुरोधाने त्यांनी समाजसुधारणेचे हे काम सुरू केले. धर्मविषयाची ही दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची होती. केशवचंद्रांचे हे कार्य जोमदारपणे चालले असता १८७८ मध्ये केशवचंद्रांच्या विरोधात साधारण ब्राह्मसमाज नावाची, अधिक विकसित स्वरूपाची आवृत्ती निर्माण झाली. ब्राह्मसमाजाच्या स्थापनेपासून राजा राममोहन रॉय, देवेंद्र  अथवा केशवचंद्र ह्या एकेका प्रभावी व्यक्तीची सत्ता चालत होती. पण  ब्राह्मसमाज ही स्वतंत्रतावादी संस्था होती, साधारण ब्राह्मसमाजाच्या निर्मितीला निमित्त केशवचंद्रांच्या चौदा वर्षांहून कमी वय असलेल्या मुलीच्या लग्नाचे झाले. ब्राह्म वधूचे वय किमान चौदा वर्षाचे असावे असा सरकारी कायदा केशवचंद्रांनी पास करून घेतला होता व त्यांच्या स्वत:च्या मुलीचे वय चौदाहून थोडेसे कमी असता कुचबिहारच्या राजकुमाराशी तिचा विवाह त्यांनी केला होता. व्यक्ती कितीही मोठी असो, समाजाच्या मताप्रमाणे तिची वागणूक घडली पाहिजे ह्या तात्त्विक भूमिकेनरून व अनुष्ठानाच्या मुद्द्यावरून केशवचंद्रांच्या प्रिय शिष्यांनीही त्यांचे नेतृत्व झुगारून दिले व ‘साधारण ब्राह्मसमाजाची’ची स्थापना केली. ह्यानंतर ब्राह्मसमाजात स्त्रिया, तरुण, लहान मुले, वृद्ध, विद्वान गृहस्थ आणि कामकरीवर्ग ह्या सर्वांचा समान दर्जाने समावेश होऊ लागला व साधारण ब्राह्मधर्माच्या शाखा भारतभर जोमाने सुरू झाल्या.

पाश्चात्यांचा युनिटेरियन समाज असो, की हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज असो ह्या एकेश्वरी पंथाच्या उभारणीमध्ये काही समान तत्त्वांचा आढळ होतो. ह्या समान तत्त्वांचे विवरण विठ्ठल रामजी शिंदे यांनी ब्राम्ह्य तत्त्वांच्या अनुरोधाने उत्तम प्रकारे केले आहे. पहिले तत्व म्हणजे मोकळा विश्वास हे आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्धी अथवा विवेक म्हणून एक शक्ती असते त्याप्रमाणे त्याच्यामध्ये श्रद्धा अथवा विश्वास अशी असते. ब्राह्मधर्माचे तत्त्व असे आहे की, ह्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध अथवा दडपण असू नये. स्वाभाविक कारणांनी विश्वास कमी होत असेल किंवा नष्ट होत असेल तर तो होऊ द्यावा. अन्य कारणांनी नवा विश्वास उत्पन्न होत असेल अथवा जुना दृढ होत असेल तरी तो होऊ दिला पाहिजे हे मोकळ्या विश्वासाचे लक्षण होय. ब्राह्मचे दुसरे तत्त्व म्हणजे आपले ज्ञान सतत वाढते राहील ह्या गोष्टीला दिलेले महत्त्व. अद्वैतवाद्यांचा अद्वैत सिद्धान्त हे वाढते ज्ञान नव्हे. प्रत्येक व्यक्तीस जे नवे नवे अनुभव येतात, आजूबाजूच्या वातावरणात जे नाना प्रकारचे शोध लागतात त्या सर्वांचा सुसंस्कार होऊन व्यक्तीची जी प्रज्ञा तयार होते ती प्रगमनशीलच असणार. असे नवे ज्ञान सतत आत्मसात करणा-या वृत्तीचे ब्राह्मधर्मास महत्त्व वाटते. शुद्ध प्रीती हे ब्राह्माचे तिसरे तत्त्व. ही प्रीती कोणत्याही लाभाच्या अपेक्षेशिवाच असावी लागते. निरंतर आणि निर्लोभ प्रेम हे ब्राह्मधर्माचे तिसरे आवश्यक लक्षण आहे. ब्राह्मधर्माचे चौथे लक्षण सात्त्विक सेवा हे होय. अपेक्षारहित प्रमभावनेने सेवा केली म्हणजे निराशा आणि शीण येण्याचा संभव नसतो उलट ही सात्त्विक सेवा करीत असता प्रतिक्षण आनंदच होत असतो.७

संदर्भ
१. केसरी, १२ नोव्हेंबर १९४०
२. टो. ना. (आर.) ख्रिश्चन धर्म आणि आधुनिक विवेकवादाचा उद्य, नवभारत, डिसेंबर १९७८-जानेवारी १९७९
३. जे. डब्ल्यू. आयरन, ख्रिस्ती धर्म, मराठी विश्वकोश, खंड ४, पृ. ७५३.
४. विठ्ठल रामजी शिंदे, ‘युनिटेरियन  समाज लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ४१, ४७.
५. विठ्ठल रामजी शिंदे, यांचे अँमस्टरडॅम येथे १९०३ सप्टेंबरमध्ये भरलेल्या उदार धर्माच्या
   सभेपुढील भाषण, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १५६.
६. तत्रैव, पृ. १५७.
७. विठ्ठल रामजी शिंदे, ‘ब्राम्ह्यधर्म व ब्राम्ह्यसमाज’, तत्रैव, पृ. १४३-४५.

उपसंहार

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे समग्र जीवन व कार्य बघितल्यानंतर आपल्या मनावर ठसा उमटतो तो एका धर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, त्यागशील, द्रष्ट्या अशा संपन्न व्यक्तिमत्त्वाचा. त्यांच्या उन्नत आध्यात्मिक मनोवृत्तीचा. विचार, उक्ती व कृती यांमध्ये आयुष्यभर स्वाभाविकपणे सुसंगती राखणा-या सच्च्या व्यक्तिमत्त्वाचा. विविध प्रकारच्या कार्यसिद्धीमध्ये त्यांनी कल्पक सर्जनशीलता दाखविली व अपूर्व कार्यक्षमता प्रकट केली. त्यांच्या ठायी तरल संवेदनशीलता होती आणि मनमोकळी प्रगल्भ सौंदर्यग्राही मनोवृत्ती.


महर्षी शिंदे यांचा समकालीन सुधारकाहून असणारा वेगळेपणा व त्यांची वैशिष्ट्यपूर्णता हीही आपल्या मनावर ठसल्यावाचून राहत नाही. ते कर्ते सुधारक होते. त्यांच्या सर्व कार्याला धर्मभावनेचे अधिष्ठान होते. त्यांचा विचार त्यांची कार्य शहरी लोकांपुरते सीमित नव्हते, तर खेडेगावातील लोकांच्याही सर्वांगीण उन्नतीचा विचार ते सदैव करीत; त्यानुसार कार्य करीत. त्यांचा दृष्टीकोण व्यापक होता. त्यात कुठेही एकांगीपणा, एकदेशीयता नव्हती. एकात्मता पाहण्याची त्यांची दृष्टी होती व एकात्मता निर्माण करण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांच्या ठायी अपवादात्मक तत्त्वनिष्ठा होती. लोकांच्या अनुनयासाठी त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली नाही, कधी तडजोड केली नाही. त्यांच्या लेखनाला अधिष्ठान होते तेही आध्यात्मिकतेचे.


महर्षी शिंदे हे कृतिवीर होते. केवळ अमुक सुधारणा करणे योग्य आहे असे सांगत राहून जुन्या मताच्या बहुसंख्य लोकांची समजूत बदलण्याची वाट पाहत राहणे त्यांच्या मनःप्रवृत्तीला मानवण्याजोगे नव्हते. आपल्याला मान्य असेल ती सुधारणा करण्यासाठी झटावे व सुधारणेचा काळ अलीकडे खेचून आणावा असे त्यांना तीव्रपणे वाटत असे आणि आपल्या वाटण्यानुसार तात्काळ कृतीला प्रारंभ करावा अशी त्यांची उत्कट मनःप्रवृत्ती होती. सुधारणेची कृती करण्यामुळे केवळ अप्रियताच नव्हे तर काहींचा रोष वाट्याला आला तरी तो सहन करण्याची त्यांच्या मनाची तयारी असे.


महर्षी शिंदे यांच्या कृतिनिष्ठतेचे उज्ज्वल उदाहरण म्हणजे त्यांनी केलेले अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य. त्यांचे हे कार्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे अखिल भारतीय पातळीवरील कार्य होय. या कामाता त्यांचा द्रष्टेपणा दिसतो, तसाच कर्तेपणाही दिसून येतो. त्यांनी केलेला अस्पृश्यतानिवारणाचा प्रयत्न हा न्यायाच्या, मानवतेच्या आणि विवेकाच्या पायावर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याचा अभूतपुर्व प्रयत्न होता. आपण पाहिले आहेच, की एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला महात्मा फुल्यांचा अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचा युगप्रवर्तक प्रयत्न पांढरपेशावर्गाची साथ न मिळाल्यामुळे खंडित झाला होता. विसावे शतक उजाडले तेव्हा भारतीय समाजजीवनात अस्पृश्यतेची म्हणून एक कलंकभूत रूढी आहे याची कुणालाही जाणीव नव्हती, एवढी अस्पृश्यता समाजजीवनातील स्वाभाविक बाब म्हणून अंगवळणी पडलेली होती. सर्व भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची कशी दयनीय, दारुण अवस्था आहे हे शिंदे यांनी भारतभर हिंडून पाहिलेले होते, अनुभवलेले होते. १९०१ सालच्या खानेसुमारीच्या अहवालाचा अभ्यास करून अस्पृश्य मानला जाणारा वर्ग एकंदर भारतीयांच्या सातव्या हिश्श्याने आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अस्पृश्यता हा एक प्रकारचा बहिष्कार असून अस्पृश्यवर्गाचे वर्णन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ या संज्ञेने केले. आपल्यापैकीच असणा-या काहीजणांना अस्पृश्य मानणे हे देशभर चाललेले सैतानी दुष्कर्म (नॅशनल इव्हल) आणि सगळ्या देशाचे पाप (नॅशनल सिन) आहे याची जाणीव त्यांनी १९०५-१९०६ साली आपल्या लेखांच्या व भाषणांच्याद्वरा करून दिली. समाजातील एवढ्या मोठ्या वर्गाला उच्च दर्जाची कामे करून न देणे ही बाब आर्थिकदृष्ट्याही मोठी हानिकारक आहे हेही त्यांनी जाणवून दिले.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभरात जी कार्ये केली, त्या प्रत्यक्ष कार्याचे महत्त्व तर असाधारण आहेच; त्याशिवाय या कार्याच्या पाठीमागे असणारी त्यांची वैचारिक भूमिका हीही मौलिक स्वरूपाची असे व लोकांची मानसिकता घडविण्याच्या दृष्टीने तिचेही महत्त्व फार मोठे होते. अस्पृश्यवर्गासंबंधी करावयाच्या कामाचे त्यांचे आकलन दुहेरी होते. एक, शतकानुशतके अस्पृश्यता लादल्यामुळे निर्माण झालेला ह्या वर्गाचा निकृष्टपणा नाहीसा करण्यासाठी त्यांना शिक्षण देणे, नोकरी-उद्योगाला लायक बनविणे, त्यांचा आत्माभिमान जागृत करणे, स्वतःची स्थिती सुधारण्यासंबंधी तळमळ निर्माण करणे हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला. तर स्पृश्य लोकांच्या मनात काही जातीत जन्मलेल्यांना अस्पृश्य मानण्याची जी भ्रामक कल्पना असे ती दूर करणे, म्हणजेच सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करणे हा त्यांनी आपल्या कामाचा दुसरा भाग मानला. अस्पृश्यवर्गाची उन्नती ध्यानात घेऊन आपल्या सामाजिक परंपरेला अपरिचित असणारी मिशनची कल्पना त्यांनी अवलंबिली. एखाद्या कामाला सर्वस्वी वाहून घेऊन समर्पणाच्या भावनेने संस्थेच्याद्वारा काम करणे ही मिशनची कल्पना होय. १९०६ साली त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली व पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांमध्ये मिशनच्या शाखा स्थापन करून शाळा व उद्योगशाळा चालवून अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक पातळीवर अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी व्याख्याने, परिषदा यांचे आयोजन केले. ‘प्यरिटी सर्व्हंट’ सारखे मुखपत्र व आईवडिलांच्या निराशेला कारणीभूत होऊ नये यासाठी हाताला व डोक्याला उद्योगाचे वळण मिळावे यासाठी उद्योगशाळा चालविण्याबाबत त्यांचा कटाक्ष होता.


अस्पृश्यांसंबंधीचे कार्य असो, की धर्मविषयक अथवा शेतक-यांसंबंधीचे काम असो, शिंदे यांच्या असाधारण संघटनाकौशल्याचा प्रत्ययही ह्या विविध कामांत दिसून येतो. अस्पृश्यता समूळ नाहीशी करण्याची गरज सगळ्या राष्ट्राला जाणवून द्यावी ह्यासाठी त्यांनी १९०६ पासून राष्ट्रसभेच्या वार्षिक अधिवेशनाला जोडून अस्पृश्यतानिवारक परिषदा आयोजित केल्या. त्यासाठी सत्येंद्रनाथ टागोर, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, सयाजीराव गायकवाड, म. गांधी यांच्यासारखे अध्यक्ष मिळविले. महाराष्ट्राच्या पातळीवर १९१२ साली पुण्यात मिशनची महाराष्ट्र परिषद आयोजित केली. १९१८ साली मुंबईस सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भरवलेली अस्पृश्यतानिवारक परिषद देशाच्या पातळीवर महत्त्वपूर्ण ठरली. आपण व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही अशा प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर देशातील तीनशे पुढा-यांच्या सह्या त्यांनी मिळविल्या. अस्पृश्यतानिवारण कार्याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना व गृहिणींना व्हावी यासाठी त्यांनी रुपी फंड, तांदूळ फंड अशा प्रकारचे उपक्रम सुरू केले. देशातील समाजाच्या सर्व स्तरांमधून सहकार्य मिळविले. हिंदुस्थानातील मान्यवर संस्थानिक, गर्व्हनर, कलेक्टर यांसारखे मुलकी इंग्रज अधिकारी, जहाल-मवाळ राजकीय पुढारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे सवर्णातील त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गातील पुढारी इत्यादिकांचे सहकार्य मिळविणे यात महर्षी शिंदे यांचे अपूर्व संघटनकौशल्य दिसून येते. पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानात केलेल्या प्रचारदौ-यात ते विविध शहरांतील शाळा-कॉलेजमधील तरुण विद्यार्थ्यांसमोर व्याख्याने देऊन त्यांच्यामध्ये या प्रश्नाबद्दल जागृती करीत असत. फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यांचे शिक्षकही त्यांच्या कामात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे तेथील विद्यार्थीवर्गाला अस्पृश्यतानिवारण कार्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सभा घेऊन ह्या कामात भाग घेण्यासाठी शिंदे त्यांना प्रवृत्त करीत होते. अस्पृश्यतानिवारणासंबंधी अशा प्रकारच्या झटून केलेल्या प्रयत्नामुळे काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना १९१७ साली यश मिळाले.


मिशनच्या स्थापनेनंतर अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी देशभर जागृती करण्यात, ह्या प्रश्नाच्या बाबतीत व्यापक सहानुभूती मिळविण्यात विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना फार मोठ्या प्रमाणात यश आले. ना. गोखले ह्यांनी शिंदे यांच्या आणि मिशनच्या ह्या कामाचा निर्देश करून त्यांच्या ह्या कामामुळे समाजाच्या विवेकबुद्धीस खरोखरीच चालना मिळाली अशा प्रकारचे विधान जाहीर सभेत केले. अस्पृश्यतानिवारणाचे काम हे शिंदे ह्यांचे काम होय, अशा प्रकारचे समीकरण लो. टिळकांच्याही बोलण्यातून प्रकट झाले. ठक्करबाप्पांनी शिंदे ह्यांच्या कामाचे वर्णन करताना पंजाब व उत्तर प्रदेश सोडला तर सर्व भारतात या प्रकारच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होत असे म्हटले आहे.


अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल जागृती करून समाजमन मोठ्या प्रमाणात अनुकूल करण्याचे काम शिंदे करू शकले याचे कारण त्यांच्या मनाला अस्पृश्यतेचा प्रश्न झोंबलेला होता. ह्या वर्गाबद्दल त्यांच्यामनात अपरंपार कळकळ होती, प्रेम होते. म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी व अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी अमुक अमुक करावे असे त्यांना स्फुरले असणार.


समाजपरिवर्तन घडवून सामाजिक पुनर्घटना करण्याच्या बाबतीत आपण जेव्हा अस्पृश्यतानिवारणाचा अथवा जातीयता नष्ट करण्याच्या प्रश्नाचा विचार करतो तेव्हा परिपूर्ण आकलनासाठी समग्रतेचे भान ठेवावे लागते. आणि ही समग्रता महात्मा फुले, महर्षी शिंदे, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाढत्या व्यापकतेच्या क्रमाचे ऐतिहासिक टप्पे विचारात घेतले तर यथार्थपणे ध्यानात येऊ शकते. अस्पृश्यतानिवारणाच्या कामाला अग्रक्रम देऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय समाजक्रांतीचे आणि सामाजिक पुनर्घटनेचे काम पूर्ण होऊ शकणार नाही याचे सा-या राष्ट्राला भान शिंदे यांनी प्रथमतः आणून दिले.


महर्षी शिंदे यांनी १९२६ साली ब्राह्मणेतर पक्षाच्या मानपत्राला उत्तर देताना सांगितले, की आयुष्यात आपण कोणत्याही एका जातीसाठी काम केलेले नाही. त्याला अपवाद फक्त अस्पृश्य जातीचा आहे, व त्याचे कारण अस्पृश्यतेच्या प्रश्नाची प्रचंड व्याप्ती आणि तो सोडविण्याची निकड. त्यांनी म्हटले, “मला आणखी शंभर जन्म मिळाले तरी नरबळी घेणा-या अस्पृश्यतेच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही.” पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, “अस्पृश्यतानिवारण करणे हा माझा कायमचा ध्यास राहिला आहे. अस्पृश्यतेचे निवारण अद्यापि झाले नाही याची मला अन्य कोणापेक्षाही तीव्र अशी जाणीव आहे. ह्या वास्तवापेक्षा माझी श्रद्धा माझ्या कानात गुणगुणत आहे, की अस्पृश्यता निश्चित नष्ट होणार आणि केवळ ह्या श्रद्धेवरच माझ्या मनाची शांती टिकून आहे.”


शिंदे यांच्या जीवनातील दैवदुर्विलास असा, की ज्या अस्पृश्यवर्गासाठी अशा प्रकारची कळकळ अंतःकरणात बाळगून सर्वस्व होमून त्यांनी अपरंपार कष्ट केले त्या वर्गाचीच नाराजी त्यांच्यावर ओढवली. स्वकीयांनी केलेली उपेक्षा आणि अस्पृश्यवर्गाने केलेली अवहेलना पचवून शिंदे हे अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचा आणि अस्पृश्यता समूळ नाहीशी करण्याचा ध्यास आयुष्यभर कसा घेऊ शकले? याचे उत्तर म्हणजे त्यांच्या ठायी असलेली नितांत धर्मनिष्ठा. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य त्यांनी एक फुटकळ सामाजिक सुधारणा म्हणून निवडलेले नव्हते, तर ते धर्मकार्य म्हणून आंतरिक प्रेरणेच्या ऊर्मीमुळे पत्करलेले होते. त्यांनी ज्या ब्राह्मधर्माची अंतःकरणपूर्वक दीक्षा घेतली होती, त्याचे एक तत्त्व असे होते-सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्परांशी बंधुभावाने वागावे. खरे म्हणजे केवळ अस्पृश्यवर्गाची सुधारणाच नव्हे तर सुधारणेची इतर कामेही त्यांनी धर्मभावनेने केल्याचे जाणवते.


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि अन्य सुधारक यांच्यामध्ये कर्तेपणावरून जसा फरक पडतो त्याचप्रमाणे धर्मद्धेबाबत त्यांच्यामध्ये असलेला भेद जाणवतो. आपल्याकडे सामाजिक सुधारणेच्या म्हणविल्या जाणा-या कार्याची उभारणी बुद्धिवाद, उपयुक्ततावाद असा तत्त्वावर केली जाते; धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्याची अगदी तयारी नसते. शिंदे यांनी जे प्रचंड काम केले ते पाहताही ही गोष्ट आपल्या मनाला पटू शकते.


प्रत्यक्ष जीवनातील सामाजिक सुधारणेच्या ऐहिक कार्याला विठ्ठल रामजी शिंदे यांनी धार्मिक पायाचाच आधार दिला होता. त्यांच्या सर्व कार्याला आधारभूत असणारी त्यांची धर्मकल्पना ही रूढ धर्मकल्पनेपासून वेगळी होती हेही आपण लक्षात घ्यावयास पाहिजे.


विठ्ठल रामजी शिंदे यांचे आयुष्य अनेक नाट्यात्म घटनांनी भरलेले आहे. त्यांपैकी त्यांच्या जीवनीतील पहिली प्रमुख घटना म्हणजे आपले आयुष्य उदार धर्मकार्याला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी अंतःप्रेरणेने घेतला व लगेच तो गुरुवर्य डॉ. भांडारकरांना सांगितला. आचारविचाराच्या दृष्टीने सामान्यतः परंपरानिष्ठ मानल्या गेलेल्या मराठा समाजातील एका पदवीधर तरुणाने शंभर वर्षांमागे अशा प्रकारचा निर्णय घेऊन तो अमलात आणणे ही अपूर्व गोष्ट होती. घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना व ते निवारण्यासाठी आणि सुखाचे जीवन जगण्यासाठी मोठ्या पागाराची संस्थानामधील नोकरी मिळण्याची शक्यता दृष्टीच्या टप्प्यात असता विठ्ठल रामजींनी अशा प्रकारचा निर्णय घेतला. एकांतात तपश्चर्या करून व्यक्तिगत पातळीवर पारमार्थिक श्रेयस मिळविण्याचा त्यांचा हेतू नव्हता तर उन्नत धर्माचा प्रचार करून सर्वसामान्य माणसाचे जीवन सर्व अंगांनी उंचावण्याची कळकळ त्यांच्या ठिकाणी होती. हा निर्णय त्यांनी अंधश्रद्धेच्या अधीन होऊन घेतलेला नव्हता. तर मोठ्या विवेकशीलतेने विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता.


विठ्ठल रामजींनी हा निर्णय आत्यंतिक धर्मनिष्ठेने घेतला होता हे तर उघडच आहे. घरातील वारकरी संप्रदायाच्या उदार संस्कारामुळे त्यांची धर्मनिष्ठा प्रबळ झालेली होती आणि प्रार्थनासमाजाच्या द्वारा त्यांना उन्नत एकेश्वरी मताचा परिचय झालेला होता. धर्म ही बाब सगळ्या माणसांच्या जीवनावर सत्ता गाजविणारी आहे हे वास्तव त्यांना दिसत होते. मात्र हा खराखुरा उन्नत धर्म नसून धर्माचे ते भ्रष्ट स्वरूप होते. त्यातून निर्माण झालेल्या रूढी होत्या, अंधश्रद्धा होत्या व त्यातून सर्वसामान्य माणसाचे जीवन हीन दशेला पोहचलेले त्यांनी पाहिलेले होते. अस्पृश्यता पाळणे, मुरळी सोडणे, देवतांना बळी देणे, भोंदू बुवांच्या मागे लागणे अशा अत्यंत अनिष्ट स्वरूपाच्या रूढी धर्माच्या नावाखाली प्रचलित होत्या. त्यामुळे माणसांच्या स्वाभाविक सत्प्रवृत्तीवरही पटल येऊन ही माणसे अवनत अवस्थेतील जीवन जगत होती. शिंदे यांनी वारकरी धर्माचे उज्ज्वल स्वरूप जाणले होते. ब्राह्मसमाज आणि प्रार्थनासमाज ह्या विवेकशील धर्माची तत्त्वे त्यांच्या मनाला भावली होती. पाश्चात्त्य जगात ख्रिश्चन धर्मातून विकसित झालेल्या युनेटिरिअन ह्या उन्नत धर्ममताचाही त्यांना उत्तम परिचय झाला होता. युनेटिरिअन अथवा एकेश्वरी धर्ममत हे सुधारलेल्या जगाचे ‘अंतर्याम’ (कॉन्शन्स) होय, अशी त्यांची खात्री पटलेली होती. त्यांनी पत्करलेला धर्म हा बुद्धीला अविरोधी असणारा विवेकशील धर्म होता. तेव्हा रूढीलाच धर्म समजून वागणा-या लोकांना या उन्नत धर्माकडे वळविणे म्हणजे त्यांची भ्रांत धर्मकल्पना, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यांच्यापासून सोडवणूक करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावणे अशी त्यांची खात्री पटलेली होती. त्यांच्या मते धर्मसुधारणा ही सुधारणेची एक स्वतंत्र बाब नव्हती, तर जीवनाच्या सर्वच अंगांची सुधारणा करणे होते. महर्षी शिंदे यांची धर्मभावना जीवनव्यापी व इहनिष्ठ होती. जीवनाच्या प्रत्येक बाबीला, प्रत्येक कार्याला उन्नत धर्मभावनेचे अधिष्ठान असावे लागते अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या धर्मकल्पनेत निवृत्ती नसून प्रवृत्ती आहे. ते श्रद्धेच्या जोडीनेच निर्लोभ प्रेमाचा समावेश धर्मकल्पनेत करतात. प्रेमाचे स्वरूप सांगताना ते म्हणतात, “प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे; प्रेम म्हणजे जीवन; जीवनाचा कंटाळा नव्हे.” समाजसेवेलाही प्रेमाचे अधिष्ठान असल्याचे ते सांगतात. त्यांच्या दृष्टीने प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. द्वा. गो. वैद्य यांच्या लेखसंग्रहाला संपादकांनी दिलेल्या संसार आणि धर्मसाधना या नावाला आक्षेप घेताना ते म्हणतात, “धर्मसाधन म्हणजे काय? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे म्हणजे धर्मसाधन काय? मुळीच नव्हे. ब्राह्मसमाज म्हणतो प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजेच धर्मसाधन होय. एखादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी विशेषतः प्रेमळ भंगीदेखील पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय? असे जर आहे तर संसार म्हणजे धर्मसाधन ठरते.”

Read more: उपसंहार

इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष

पालकरांच्या वाड्यात विठ्ठलरावांचे आणि गोविंदरावांचे बि-हाड जणू एकत्र कुटुंबपद्धतीप्रमाणे वागत होते. दोन्ही कुटुंबांचा स्वयंपाक एकत्रच होत असे. गोविंदरावांच्या पत्नी जुन्या वळणातल्या, काहीशा अबोल स्वभावाच्या व आपण भले की आपले काम भले अशा बेताने वागणा-या होत्या. त्यांचा स्वभाव विठ्ठलरावांच्या आईशी आणि जनाबाईंशी जुळणारा होता.
 
आपल्या कुटुंबातील स्त्रियांना शहर आणि शहरातील बघण्याजोगी ठिकाणे दाखवावी याचा विठ्ठलरावांना उदंड उत्साह असे. किंबहुना घरच्या स्त्रियांना शहरात आणण्याच्या पाठीमागे त्यांचा हा एक सुधारकी हेतू होता. त्यांनी घरच्या सर्वांना चतुःशृंगी, बंडगार्डन, एम्प्रेस गार्डन वगैरे स्थळे मोठ्या हौसेने दाखविली. मंडईजवळील मोठा गणपती पाहून तर विठ्ठलरावांच्या आईला फारच आश्चर्य वाटले. एवढा मोठा गणपती कसा तयार करीत असतील याची त्या कल्पनाही करू शकत नव्हत्या. मंडईचा गणपती दाखविताना विठ्ठलरावांचे वाईचे मित्र केशवराव कानिटकर बरोबर होते. भला मोठा गणपती बघितल्यावर आई  आश्चर्य करू लागल्यावर ते म्हणाले, “आई, हा गणपती म्हणजे काहीच नाही. कृष्णेच्या काठावरचा आमचा वाईचा गणपती पहाल तर रात्री झोपदेखील येणार नाही इतका भयंकर मोठा आहे.”१ मंडईतल्या गणपतीप्रमाणेच त्यांच्या आईला बंडगार्डनवरील धबधब्याची शोभा पाहूनही फार समाधान वाटले.

प्रेक्षणीय स्थळे व निसर्गरम्य ठिकाणे दाखविण्यात विठ्ठलरावांना जसा उत्साह होता त्याचप्रमाणे शहरी राहाटी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना माहिती व्हावी अशीही विठ्ठलरावांची इच्छा होती. पुण्यामध्ये त्या वेळेला नुकत्या झालेल्या रे मार्केटात विठ्ठलरावांनी आपली आई व चार-पाच वर्षांची धाकटी बहीण चंद्राबाई ह्यांना मंडई दाखविण्यास एकदा नेले. टोमॅटो, श्रावण घेवडा, सुरण, चौधारी शेंगा ह्या भाज्या पाहून आईला व जनाबाईला आश्चर्य वाटले. या भाज्या त्या प्रथमच पाहात होत्या. टोमॅटो हे नाव तर जमखंडीस असताना त्यांनी ऐकलेही नव्हते. चंद्राबाईने दुकानासमोर ठेवलेल्या भल्या मोठ्या सुरणावर आपला पाय घाशीतच विठ्ठलरावांना विचारले, “अण्णा, ही दगडासारखी काळीरकुट्ट भाजी पुण्यातले लोक कसे हो खातात?”२ बिचारे विठ्ठलराव ह्या सगळ्यांच्या प्रश्नाला शक्य तेवढी खुलासेवजा उत्तरे देत. मंडईत आलेले अस्सल पुणेकर मात्र मंडई बघणा-या ह्या खेड्यातून आलेल्या कुटुंबाकडे कुतूहलाने बघत होते.

एके दिवशी विठ्ठलरावांनी घरी पाव आणला. पाव हा पदार्थ जनाबाईने बघितला नव्हता. आपली काहीतरी चेष्टा करण्याच्या हेतूने ही कापसासारखी वस्तू खायला दिली आहे असे समजून त्यांनी तो बाजूला सारला. त्या काळात पुण्यात सायकल क्वचित दिसत असे. सर्कशीत काम करणा-याकडे बघावे त्याप्रमाणे सायकलवर बसून जाणा-याकडे आई एकटक बघायची. हा पडेलबिडेल की काय अशी धास्तीच त्यांच्या मनात असायची.

१८९५च्या इंटरमीजिएटच्या वर्षात विठ्ठलरावांच्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या. १८९५च्या अखेरीस पुण्यास अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. बंगालचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे नावाजलेले वक्ते व देशभक्त संमेलनाचे अध्यक्ष होते. ह्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या वेळी विठ्ठलरावांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.३ राष्ट्रीय कार्याकडे असलेला त्यांचा ओढा ह्या वेळीच स्पष्टपणे दिसून आला. पुण्यातल्या सनातनी मंडळींनी सामाजिक परिषदेच्या मंडपाचे निमित्त करून ह्या अधिवेशनापूर्वी मोठाच गोंधळ घातला होता. सनातनी लोकांचा बुरसटलेला दृष्टिकोण, त्यांची हुल्लडबाजी करण्याची वृत्ती विठ्ठलरावांना पसंत पडणे शक्य नव्हते. ते समाजसुधारणेच्या बाजूचे तर आधिपासूनच होते. ह्या अधिवेशनाच्या सुमारास ते राष्ट्रीय पक्षाचे झाले व स्वयंसेवक होण्याच्या प्रत्यक्ष कृतीतून ते प्रकट झाले. हा राष्ट्रीय बाणा आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या ठिकाणी उत्कटत्वाने वास करीत रहिला.

विठ्ठलरावांच्या चरित्रावर परिणाम घडविणारी आणखी एक घटना ह्या सुमारास घडली. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनने डॉ. जे. टी. संडरलॅंड ह्या तळमळीच्या मिशनरी गृहस्थाला आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. राष्ट्रीय सभेत त्यांचे जोरदार भाषण विठ्ठलरावांना ऐकावयास मिळाले. हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज किंवा महाराष्ट्रातील प्रार्थनासमाज ह्यांच्या पूर्वी युनिटेरियन ह्या पाश्चात्त्य धर्मपंथाचा परिचय त्यांना घडून आला. डॉ. संडरलॅंड यांची विठ्ठलरा्वांनी समक्ष भेट घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. विठ्ठलरावांचे नव्याने मित्र झालेले झालेले वासुदेव अनंत सुखटणकर हेही संडरलरॅंड यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्यासमवेत होते. युनिटेरियन पंथाच्या अनेक लहान लहान चोपड्या डॉ. रे. संडरलॅंड यांच्याकडून त्यांनी वाचावयास नेल्या. ह्याच वर्षी पुणे येथील प्रार्थनासमाजात एक लहानशी एकेश्वरी पंथाची परिषद भरली होती हे विठ्ठलरावांना पुढे कितीतरी वर्षांनी कळले. डॉ. संडरलॅंड यांनी आपल्या देशातील युनिटेरियन सभेला कामाचा अहवाल सादर करताना एक विशेष सूचना केली. सूचना अशी की, हिंदुस्थानातील एकेश्वरी पंथाचा, म्हणजे ब्राह्म व प्रार्थनासमाजाचा एक तरुण होतकरू विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड येथील धर्माला वाहिलेल्या कॉलेजात स्कॉलरशिप देऊन बोलावण्यात यावा. त्यांच्या ह्या सूचनेप्रमाणे कलकत्त्याहून दर दोन वर्षांनी एक असे तीन विद्यार्थी पाठविल्यानंतर ह्या कामी खुद्द विठ्ठलरावांची निवड करण्यात आली. भविष्यात असे काही घडेल याची पुसटशी कल्पनादेखील विठ्ठलरावांना त्या वेळी असणे अशक्य.

विठ्ठलराव रे. जे. टी. संडरलॅंड यांना समक्ष भेटले. त्यांच्याशी विचारविनिमय केला. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या धर्माबद्दल आस्था आणि उत्साह असणा-या भारतीय तरुणाची भेट झाल्यामुळेसुद्धा रे. संडरलॅंड यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला असणे शक्य आहे की, याच्यासारख्या धर्मजिज्ञासा असणा-या भारतीय तरुणाला इंग्लंड-अमेरिकेतील धर्माचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्याची व्यवस्था केली तर धर्मकार्याच्या प्रसाराला चांगली मदत होण्यासारखी आहे. संडरलॅंड यांच्या भेटीचा विठ्ठलरावांवर प्रभाव पडला. त्याचप्रमाणे रे. संडरलॅंड यांच्या लक्षात विठ्ठल रामजी शिंदे चांगलेच राहिले होते असे दिसते. कारण ऑक्सफर्ड येथील कॉलेजात धर्मशिक्षण घेण्यासाठी निवड करणा-या अंतिम मंडळात ते एक सभासद होते.

विठ्ठलरावांची पैशाची विवंचना मात्र मिटलेली नव्हती. त्यांना पुन्हा इंटरमीजिएटच्या परीक्षेला बसावयाला लागले. पुण्यास ते व बहीण जनाक्का होती. शिवाय १८९६ मध्ये त्यांनी पत्नीलाही पुण्याला नेले व बहीणीबरोबर शाळेत घातले. पुण्यास तिघांचा खर्च तर त्यांना करावा लागायचाच परंतु जमखंडीस त्यांचे आईवडील व तीन भावंडे यांच्या खर्चाची व्यवस्था करणेही त्यांना भाग होते. विठ्ठलराव आणि जनाक्का यांचे स्कॉलरशिपचे दरमहा प्रत्येकी दहा रूपये अशी वीस रूपयांची जमा होत असे. शिकवणीच्या पाच-सात रुपयांची पडलीच तर भर पडत असे. बाकीच्या खर्चाचे कर्ज होऊ लागले. त्यामुळे खर्चाची मोठी काळजी त्यांना पडली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे, “माझ्या तीन सख्ख्या बहिणी; पण प्रपंचाची काळजी ही चौथी एक जन्माची सख्खी बहीण होती.” पैशाची अडचण थोडीफार दूर व्हावी असा एक मार्ग विठ्ठलरावांना सुचला. ह्या आर्थिक ओढाताणीत असतानाच विठ्ठलराव इंटरमीजिएटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. पुढची बी. ए. ची दोन वर्षे कशी जावी हा घोर तसाच राहिला. अशा परिस्थितीत त्यांना बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराज भेट घ्यावी असा विचार आला. बडोदा येथे श्री. लक्ष्मणराव माने व श्री. खासेराव जाधव या प्रतिष्ठित मराठा गृहस्थांशी त्यांचा परिचय झाला होता. ह्या दोन सद्गृहस्थांच्या शिफारशीमुळेच महाराजांनी विठ्ठलरावांसारख्या विद्यार्थ्याची गाठ घेतली. महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रुपये स्कॉलरशिप दिली. ही रक्कम त्यांना ‘डेक्कन मराठा असोसिएशन’ द्वारेच मिळावयाची होती. ही मदत मिळते म्हणून संस्थेने आपली दहा रूपयांची मदत बंद केली. म्हणजे वस्तुतः पंधरा रुपयेच त्यांना जास्तीचे मिळू लागले. परंतु त्यांची निकडीची आर्थिक विवंचना दुर करण्याच्या दृष्टीने ही मदतसुद्धा फार उपयोगाची होती. हीस्कॉलरशिप देताना विठ्ठलरावांकडून स्टॅम्पवर एक कायदेशीर बाँड लिहू्न घेण्यात आला. त्यात शिक्षण संपल्यावर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरीस राहावे, नाहीतर घेतलेल्या स्कॉलरशिपची रक्कम परत करावी असा स्पष्ट करार होता.
          
संदर्भ   
१. जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, साप्ताहिक तरूण महाराष्ट्र, २५-३-१९४९
२. तत्रैव, १-४-१९४९
३. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, प. १०६.

आजी-आजोबा आणि आई-वडिल

विठ्ठल रामजी शिंदे यांचे बालपण कसे गेले या संदर्भातील घटना जर आपण बघितल्या तर कालानुक्रमे त्यांच्या बालपणी काय घडले एवढी साधी माहिती मिळते असे नव्हे, तर त्यांच्या बालपणीच्या चरित्रातील तपशीलही महत्त्वाचा वाटतो.  याचे कारण, त्यांचे जे व्यक्तिमत्त्व घडले व भावी आयुष्यात त्यांच्या हातून जे कार्य घडले त्याच्याशी ह्या तपशिलाचा महत्त्वपूर्ण संबंध आहे असे खोलपणे पाहिले असता जाणवते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी जमखंडी या हल्ली कर्नाटक राज्यात असलेल्या गावी झाला.  हे गाव विजापूरच्या पश्चिमेस ३६ मैलांवर आहे.  त्या काळी जमखंडी हे पटवर्धनांच्या अमलाखालील ५२४ चौ.मैल क्षेत्रफळ असलेले छोटेखानी संस्थान होते.१  कोण्णूरच्या देसायांच्या अमलाखाली काही काळ हा भाग होता.  पुढे गोपाळराव पटवर्धन सरदारांनी हा मुलूख आपल्या ताब्यात घेतला.  गोपाळराव पटवर्धनांनी रामचंद्रराव आप्पासाहेब यांना दत्तक घेतले.  १८५३ मध्ये राज्याच्या अधिकाराची सूत्रे हाती घेतल्यापासून सुमारे ५० वर्षे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये लोकहिताच्या दृष्टीने राज्यकारभार केला.  विशेषतः प्रजाजनांना मोफत शिक्षण मिळण्याची सोय त्यांनी उपलब्ध केली.  वाचनालये काढण्यास उत्तेजन दिले.  पाश्चिमात्य सुधारणेचा चांगला भाग आपल्या संस्थानात आणला.  या ब्राह्मणी संस्थानामध्ये शिक्षणाला अनुकूल अशा प्रकारचे वातावरण होते.  

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पूर्वजांपैकी त्यांच्या आजोबांपासूनची निश्चित स्वरूपाची माहिती मिळू शकते.  त्यांच्या आजोबांचे वडील चंद्रोजीराव हे विजापूरपैकी सुरापूरचे जहागीदार असण्याची शक्यता स्वतः शिंदे यांनी नमूद केली आहे.  सौंदत्ती येथे बाराव्या शतकात शिंदे घराण्याचे राज्य होते.  त्या घराण्याशी सुरापूरच्या शिंदे घराण्याचा संबंध असण्याचा तर्क तेवढा करता येतो.  चंद्रोजीराव हे लढाईत मारले गेले व त्यांचे चिरंजीव, म्हणजे शिंदे यांचे आजोबा बसवंतराव हे जमखंडीस आप्पा दफ्तरदारांचा मळा करून स्वतंत्र राहू लागले.  त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाबद्दल व त्यांच्या हिकमती विनोदी स्वभावाबद्दल बालपणीच लहानग्या विठूला आदर आणि आकर्षण वाटत होते.  त्यांची छबी कशी दिसत होती याचे वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे, ''ते फार पाणीदार व कर्तृत्ववान पुरुष होते.  शरीर सडपातळ, उंच, वर्ण चांगला गोरा, डोळे लाल, भुवया कोरलेल्या, अशी एकंदर उठावदार आकृती होती.  त्यांचा पोशाख अस्सल दरबारी मराठेशाहीचा होता.  तंगदार पांढरी विजार, घोळदार अंगरखा, पांढरी बिपिळाची बत्ती, मिशा झुपकेदार, शुभ्र, लांब व ताठ.  एकंदर रुबाब मनात भरण्यासारखा होता.  पुरुष हिकमती व विनोदी होता.''२  त्यांचे बोलणे चटकदार व विनोदी असायचे.  बसप्पा अथणी ह्या, आपल्या मुलाच्या वाणी मित्रावर त्यांनी विनोदी पद्य रचले होते.  बसवंतराव हे जमखंडीस मान्यतेने व सुखवस्तूपणे राहत होते.  ते लष्करी पेशाचे वाटत असत, पण त्यांनी धंदा शेतकीचाच केला.  लोक त्यांना सुभेदार म्हणत असत.  ह्यावरून त्यांनी लष्करात कोठेतरी सुभेदारी केली असावी असा तर्क विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला आहे.  त्यांचा मृत्यू सुमारे १८७८-७९ मध्ये झाला.  विठ्ठल रामजींचे आजोबा बसवंतराव यांचा खानदानीपणा, स्वाभिमानाने राहणे व विनोदी स्वभाव हे गुण विठ्ठल रामजींच्यामध्ये उतरले असावेत असे म्हणावेसे वाटते.

शिंदे यांच्या आजीचे नाव संताबाई असे होते.  मुधोळच्या जवळ असलेले लिंगनूर नावाचे खेडे ही त्यांच्या आजीची जन्मभूमी.  शिंदे यांच्या घराण्याची कुलदेवता तुळजापूरची अंबाबाई.  येथील भोपे भाऊराव कदम हे त्यांचे आश्रित.  त्यांच्या वहीमध्ये विठ्ठल राजमींच्या आजोबांचे नाव बसवंतराव आणि आजीचे संताबाई आहे असे त्यांनी स्वतःच विठ्ठल रामजी शिंदे यांना सांगितले होते.  या कानडी मुलखात त्यांच्या आजोबांना बसप्पा व आजीला सत्यव्वा असे म्हणत.  त्यांच्या आजीचा स्वभाव करारी व काही प्रमाणात तामसी होता.  ती वर्णाने काळी, रूपाने राकट पण संसारात शहाणी, उद्योगी व कर्तृत्ववान बाई होती.  त्यांच्या आजीचे माहेर गरीब असावे.  म्हणून आजीचा भाऊ व्यंकप्पा हा आपल्या मुलासह बसवंतरावांच्याच घरी राहावयाला होता.  आजीची माहेरकडील कुलदेवता सौंदत्तीची यल्लमा होती.  आजी कष्टाळू व कर्तृत्ववान असल्याने शेतीवाडी, देवधर्म आणि घराचा कारभार आजोबांनी तिच्यावरच सोपविला होता.  शिंदे यांनी म्हटले आहे की त्यांच्या आजोबांत मराठ्यांची व आजीत कर्नाटक्यांची लक्षणे भरपूर दिसत होती.  आजी खेडवळ, राकट व कुणबाऊ, तर आजोबा नागरिक, दरबारी व गुलहौशी दिसत.  आजी सौंदत्तीच्या यल्लमाची भक्ति निष्ठापूर्वक करीत असे.  मार्गशीर्ष पौर्णिमेला दरवर्षी जमखंडी येथील पुढारी यल्लमाची मूर्ती सौंदत्तीला घेऊन जात व यात्रा संपल्यावर मिरवणूक काढून थाटाने मूर्ती देवळात आणीत असत.  शिंदे लिहितात, ''गोड खावयास व मौज पाहावयास मिळे, म्हणून मला लहानपणी यल्लमाच नव्हे तर आजीदेखील तेवढ्या वेळेपुरती फार आवडे.  धर्माचे पहिले संस्कार माझ्या कोमल मेंदूवर आजीच्या त्या द्राविडी देवतेने उठवले.  आठवण झाल्यावर मला ते अजून रमणीय वाटतात.''३  तुळजापूरची अंबाबाई व सौंदत्तीची यल्लमा याशिवाय कुंचनूरच्या महादेवाची ती यात्रा करीत असे.  शिवाय कर्नाटकातल्या चालीप्रमाणे ताईबाई ऊर्फ येळमक्कळ ताई (म्हणजे सात मुलांची माता) नावाच्या देवीची स्थापनाही करीत असे.  आजीमुळे द्राविड संस्कृतीचा आणि द्राविड देवतांचा परिचय लहानग्या विठ्ठलास झाला.  मोठपणी द्राविड संस्कृतीबद्दल अनुकूल ग्रह निर्माण व्हायला बालपणातील ह्या संस्काराची मदत झाली असणार.

आजोळ

विठ्ठल रामजींवर त्यांचे आजोबा व आजी ह्यांचे जसे काही एक संस्कार झाले, त्याचप्रमाणे त्यांच्या आईचे आई-वडील ह्या आजोळच्या माणसांचेही संस्कार झाले.  जमखंडीच्या पूर्वेस सहा मैलावर आलगूर म्हणून कृष्णाकाठी असलेले खेडेगाव हे शिंदे यांचे आजोळ.  त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई.  तिच्या आईचे नाव गंगाबाई व वडिलांचे नाव कृष्णराव काळे असे हाते.  गुडघीच्या रोगाने त्यांचा एक पाय गुडघ्यात अगदी वाकडा झाला होता व तरुणपणीच ते कायमचे लंगडे झाले होते.  म्हणून या कानडी भाषिक प्रदेशात त्यांना कुंट कृष्णप्पा म्हणजे लंगडा कृष्णराव असे म्हणत.  बसवंतराव व संताबाई ह्या शिंदे यांच्या आजी-आजोबांच्या नेमकी विरोधात्मक वैशिष्ट्ये त्यांच्या आजोळच्या गंगाबाई व कृष्णराव ह्या आजी-आजोबांच्या जोडीमध्ये होती.  इकडे बसवंतराव मराठी व संताबाई कानडी, तर तिकडे गंगाबाई मराठी व कृष्णराव कानडी असे हे जोडपे होते.  कृष्णराव हे गुडघीच्या रोगाने वर्षभर अंथरुणावर खिळले होते.  तेव्हा गंगाबाईने त्यांची अतिशय प्रेमाने व श्रध्देने रात्रंदिवस शुश्रूषा केली.  आलगूरचे कुलकर्णी गोविंद आप्पा या वैष्णव ब्राह्मण कुटुंबाचा लोभ शिंदे यांच्या आजोळच्या घरावर असे.  शिंदे यांची आजी संताबाई ही जशी धार्मिक होती तशी आईची आई धार्मिक दिसत नव्हती, पण ती स्वतःच धर्माची मूर्ती होती.  गंगाबाईचा देव म्हणजे तिचा लंगडा नवरा.  आपल्या दोन आज्यांमधील फरक वर्णन करताना शिंदे म्हणतात, ''माझ्या बाबांची आई उघड्यात वाढलेली रानदांडगी बाई होती.  पण गंगाबाई सावलीतील तुळस होती.  ज्या कुलकर्ण्यांच्या घराचा आज्याला आश्रय होता ते घराणे वैष्णव ब्राह्मणाचे असून मोठे धार्मिक होते.  वैष्णव कर्मठ असावयाचेच.  विधी, संस्कार, उपवास, व्रते, गाणी न्हाणी, सौभाग्यलेणी इत्यादींची तेथे लयलूट होती.  ह्या सर्वांचा जन्मजात संस्कार माझ्या आईच्या हाडामासांत व रोमारोमांत शिरला होता.  ती एखाद्या वैष्णव ब्राह्मणीप्रमाणे दिसत होती.  पण माझी आजी अगदी साधी.  तिच्यात रूढ धर्माचा कसलाही वरपंग नव्हता.  इतकेच नव्हे तर तिच्यात धर्मभोळेपणाही नव्हता.  मग कर्मठपणाचे तर नावच नको.''४ आपल्या आजी व आईबद्दल शिंदे लिहितात, ''माझी आजी व तिची नमुनेदार मुलगी- माझी आई- ही दोन माणसे सार्‍या आलगूर गावाला पातिव्रत्याचा व हिंदू स्त्रियांच्या चांगुलपणाचा एक अनुपम नमुनाच वाटत होता.''५  जमखंडीची आजा-आजी वारल्यावर लवकरच सुमारे १८८२-८३ मध्ये आलगूरचे आजोबा कृष्णराव वारले व १९०१ च्या सुमारास त्यांच्या आईची आई गंगाबाई ही जमखंडीस विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी वारली.  आलगुरातील त्यांचा एकुलता एक मामा रामजी हा मात्र दिवाळखोर, कर्जबाजारी निघाला.  त्याची एकुलती एक मुलगी मथुराबाई ही पोरकी होऊन जमखंडीस शिंदे यांच्या घरीच वाढली.  तिचे लग्न विठ्ठल रामजींचे धाकटे बंधू एकनाथराव यांच्याशी पुढे झाले.

जमखंडीस शिंदे यांच्या घराण्याचा लौकिक व प्रतिष्ठा मोठी असल्याने आलगुरास आजोळी त्यांचा मोठा मान ठेवला जात असे आणि ही मुलेही आलगुरास गेल्यानंतर तोर्‍यात वागत असत.  आम्ही शहरात राहणारे, शाळेत शिकणारे, मराठी बोलणारे, खाणे, पिणे, पोशाख यांची मिजास चालविणारे आणि सरकार-दरबारात वजन असलेल्या सुप्रसिद्ध व कडक बापाची मुले अशी अहंकाराची जाणीव त्या भावंडांमध्ये असे.  त्यांचे सर्व चोचले पुरविले जायचे म्हणून आजोळ आलगूर त्यांना फार आवडत असे.

विठ्ठल रामजींचे आजोबा बसवंतराव यांना दोनच अपत्ये होती.  वडील मुलगा रामजीबाबा आणि धाकटी मुलगी अंबाबाई.  रामजीबाबा यांचा जन्म अदमासे १८३५ चा.  वस्तुतः बसवंतरावांचा पेशा शेतकर्‍याचा असला तरी रामजीबाबा मात्र शेतकीकडे वळले नाहीत.  कोणा एका शास्त्रीबोवांच्याजवळ ते लिहावयाला व हिशेब ठेवायला शिकले.  ज्या आप्पा दफ्तरदारांचा मळा बसवंतराव करीत असत, त्यांच्या घरी रामजीबाबा सकाळीच फुले देण्यास जात असत व तेथे शिकणार्‍या दफ्तरदारांच्या मुलांमुळे त्यांनाही शिक्षणाची गोडी लागली असे विठ्ठल रामजींच्या भगिनी जनाबाई ह्यांनी आपल्या आठवणीमध्ये लिहून ठेवले आहे.६  एवढे खरे की, त्यांनी उत्तम प्रकारचे कारकुनी शिक्षण घेतले.  त्यांचे मोडी अक्षर इतके सुंदर होते की, त्या वेळच्या शिकणार्‍या मुलांना ते कित्ते घालून देत.  मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थानातील बिद्री या गावी त्यांना प्रथम शिक्षकाची नोकरी मिळाली.  नंतर संस्थानिकांनी त्यांना संस्थानी कारभारामध्ये बदलून घेतले.  जमाखर्चात जमखंडी दरबारात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, अशी त्यांची ख्याती होती.

त्यांचे केवळ कारकुनी शिक्षणच झाले नव्हते तर धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र वगैरे तांत्रिक विषयाची बरीच माहिती त्यांना होती.  मराठी पोथ्यांचे त्यांचे वाचन चांगले झाले होते व पोथ्यांचा तसाच शास्त्रीय वाङ्‌मयाचा संग्रहही त्यांनी चांगला केला होता.  विठ्ठलाच्या लहानपणी त्यांच्या घरी एक शास्त्री पुराण सांगायला येत असत.  यावरून गुणी माणसांची संभावना करून खानदानी लौकिक राखण्याची रामजीबाबांची प्रवृत्ती दिसून येते. त्यांच्या राहणीचे वळण ब्राह्मणी होते.  त्यांच्या पोशाखाची पद्धतीही ब्राह्मणी असे.  आजोबांप्रमाणे त्यांचा मराठेशाही वळणाचा पोशाख नसायचा.  त्या वेळच्या रूढीप्रमाणे ते ब्राह्मणासारखे दहा हात लांब धोतर नेसत असत.  त्यांचा अंगरखा मात्र मराठा बाण्याचा असे.  सर्व जातीतील संभावित माणसांचा त्यांना स्नेह होता.

विठ्ठल रामजींच्या भगिनी जनाबाई ह्यांनी आपल्या आठवणीमध्ये एक गोष्ट मोठ्या अभिमानाने नमूद केलेली आहे.  ती म्हणजे जमखंडीत पहिल्या प्रथम मुलींची शाळा स्थापन करण्यात पुढाकार घेतला तो त्यांच्या वडिलांनी म्हणजे रामजीबाबांनी.  रामजीबाबांचा स्पष्टवक्तेपणा, निर्लोभीपणा व खानदानीपणा यामुळे जमखंडी गावामध्ये लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असत.  संस्थानिक श्रीमंत आप्पासाहेब हे त्यांचे बालमित्रच होते.  कारण त्यांच्या बालपणीचे मित्र आप्पा यादवाडकर यांनाच गोपाळराव पटवर्धनांनी दत्तक घेतले होते व तेच पुढे संस्थानचे अधिपती झाले होते.  रामजीबाबांनी श्रीमंतांचे मन ह्या शाळेच्या स्थापनेसाठी वळविले.  ही शाळा इ.स. १८७० च्या सुमारास स्थापन झाली असावी.  शाळा स्थापन झाल्यावर श्रीमंतांच्या आप्‍तांपैकी रास्ते वगैरेंच्या मुलींनाही शाळेमध्ये पाठविण्यात येऊ लागले.  संस्थानचे अधिपती एकंदरीतच शिक्षणप्रसाराला अनुकूल होते.  परंतु तो काळच असा होता की, मुलींना शाळेमध्ये पाठविण्याची मानसिक तयारी मुलींच्या आईबापांची नसे.  ब्राह्मणेतरांची तर बात सोडाच, ब्राह्मणांच्या मुलींनादेखील शाळेत पाठविण्याची फारशी तयारी नसायची.  मुलींना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे मन वळवावे लागत असे.  रामजीबाबांनी हे काम आपल्या अंगावर घेतले.  शाळेतील पटावर मुलींची संख्या फार तर सतरा-अठारा असावयाची.  ब्राह्मणांच्या सात-आठ मुली, मराठ्यांच्या तीन-चार, मुसलमानांच्या दोन-तीन, साळी, माळी, वडार अशा मुलींचा भरणा केवळ रामजीबाबांच्या मोहबतीखातरच त्यांच्या पालकांनी केला असणार.  त्या काळाला अनुसरून अस्पृश्यांच्या मुलींकरिता निराळे बसण्याची सोय केली होती.  परंतु त्या क्वचितच येत असल्याचे भगिनी जनाबाई यांनी नमूद केले आहे.  मुलींची शाळेतील हजेरी पाच-सहा एवढीच असावयाची.७

रामजीबाबांचा स्वभाव फार बोलका होता.  ते आपल्या मित्राजवळ बोलत बसले म्हणजे लहानग्या विठूला ऐकण्याची फार मोठी मौज वाटत असे.  अशा वेळी बाबांचे भाषण ऐकावयास मिळावे म्हणून ते जवळपास घुटमळत असायचे.  मराठी, कानडी व मुसलमानी ते सफाईदारपणे बोलत व ऐकणार्‍यावर त्याचा प्रभाव पडत असे.  त्यांच्या बोलण्यात म्हणी फार असत.  विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे, ''मला वाटते माझे अंगी जर काही वक्तृत्व आले असेल तर त्याचे प्रथम बीजारोपण बाबांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीने केले असावे.''८

रामजीबाबा फार रागीट स्वभावाचे होते.  ''श्रीमंतांशी भांडून, सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हा ते घरी बसले, तेव्हा त्यांनी काही प्रकरणी स्वतःची तसलमात २५८९/- रुपये (पंचवीसशे एकोणनव्वद) सरकारात खर्ची घातले होते.  तेही त्यांनी १५-१६ वर्षे मागितले नाहीत.  त्यांच्या घराला भयंकर दारिद्र्य आले असता तसलमात परत मागण्याच्या याद्या केल्या खर्‍या परंतु त्यांपैकी श्रीमंत आप्पासाहेबांकडून एक कवडीही परत मिळाली नाही.''९

तरुणपणी रामजीबाबांच्या हातात पैसा खेळत असे त्या वेळी त्यांनी ऐषआराम केला.  पण नंतर त्यांचा धर्माकडे स्वाभाविक असलेला ओढा बळावला.  पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाबद्दल त्यांच्या मनात अनन्यश्रद्धा निर्माण झाली.  जमखंडीस पंढरपूरचा भजनी संप्रदाय वाढविण्याच्या कामी रामजीबाबांचा पुढाकार होता.  विठोबाचा सप्‍ताह करण्यातही त्यांचाच पुढाकार असे.  फाल्गुन वद्य द्वितीयेपासून म्हणजे तुकारामबीजेपासून षष्ठीअखेर हा सप्‍ताह विठोबाच्या मठात साजरा केला जात असे.  आरती धरण्याचा मान रामजीबाबांचा असे.  विठ्ठल रामजींनी आपल्या धार्मिक विकासात या सप्‍ताहाच्या सोहळ्याचा मोठा परिणाम झाल्याचे नमूद केले आहे.

रामजीबाबांनी आपले घराणे स्वतःच्या कर्तृत्वावर वर उचलले होते खरे, परंतु त्यांचे घर दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडले.  १८७३ च्या सुमारास जमखंडीच्या यजमानांशी भांडून ते आपण होऊनच घरी बसले.  यजमानांनी दोन-तीनदा बोलाविले तरी ते गेले नाहीत.  सुमारे सोळा वर्षे त्यांनी कोणत्याही नोकरीधंद्याशिवाय काढली.  ह्या काळात देवधर्माचे कर्मकांड फार वाढले होते.  बाबलादीच्या लिंगायत स्वामींचे त्यांच्या घरी येणे-जाणे वाढले.  बाबलादीचे स्वामी एक प्रसिद्ध सिद्ध गणले जात.  ते उघडपणे दारू पीत आणि मांसही खात हे सारे धर्माच्या नावावर उघड चालत असे.  रामजीबाबांच्या घरी आठराविश्वे दारिद्र्य असूनही ही टोळधाड आठ-आठ दिवस त्यांच्याकडे उतरत असे.  ह्यांच्यावर खर्च करण्यासाठी कर्जाचा भार मात्र वाटतस असे.  अंबाबाई, यल्लमा, विठोबा, दत्तात्रय, महालक्ष्मी ह्या प्रसिद्ध दैवतांचे संप्रदाय तर असतच, पण त्याशिवाय बबलादीचे स्वामी, रामदासी पंथ, गोसावी, बैरागी, अतिथी, अभ्यागत वगैरे अनेक खुळांचा सुळसुळाट त्यांच्या घरी सदैव चाललेला असे.  मिळकत मुळीच नाही.  उलट खर्चाचा घरबंद राहिला नाही.  ह्याचा परिणाम म्हणून शेते गेली, गुले गेली, घर गेले, दागिने गेले.  सर्व सावकाराच्या हाती गेले आणि एके दिवशी आपला मोठा वडिलोपार्जित वाडा सोडून भाड्याच्या घरात जाऊन राहावे लागले.  याही परिस्थितीत भयंकर दारिद्र्यात घराचा डोलारा सांभाळून सार्‍यांचे जिणे शक्य व सुसह्म करण्याचे श्रेय विठ्ठल रामजींची आई यमुनाबाई ह्या साध्वीकडे जाते.  शिंदे यांनी म्हटले आहे, ''या सर्व करुणरसाने भरलेल्या नाटकात मुख्य नायिकेचे पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय.''१०

विठ्ठल रामजींच्या आईचा जन्म अदमासे १८४० मध्ये झाला.  लग्नाच्या वेळी रामजीबाबा बारा वर्षांचे तर यमुनाबाई सुमारे सात वर्षांची असणार.  तिला लिहिता-वाचता येणे शक्य नसले तरी वैष्णव ब्राह्मणाचे वळण, सात्त्विक राहणी, शाकाहार, घरकामात कष्टाळूपणा व हुशारी हे गुण तिच्या ठायी होते.  ह्या दोन्ही घराण्याचे वळण ब्राह्मणी होते.  विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आईची कानडी भाषा शुद्ध वैष्णव ब्राह्मणांची तर त्यांच्या बाबांची मराठी भाषा शुद्ध देशस्थ ब्राह्मणाची.  पेहराव सवयी ह्याही ब्राह्मणी वळणाच्या.  गोपी-कृष्णावरची कितीतरी सुंदर सुंदर कानडी गाणी व पुरंदर विठ्ठलाची भजने म्हणून आई लहान मुलांना पाळण्यात निजवीत असे.  तिचा गळा फार गोड व म्हणण्यात स्वाभाविकपणेच करुणरसाचा उठाव असे.  शिंदे यांनी नमूद केले आहे की, ''मोठेपणीही ही गाणी ऐकवून व गोपीकृष्णाच्या गोष्टी सांगून ती आम्हा भावंडांच्या दारिद्र्याच्या कठीण वेदना हळुवार करीत असे.  व्रते, उपवास व इतर गृहकृत्ये ब्राह्मणांप्रमाणे करण्याला आई आलगुरात लग्नापूर्वीच शिकली असावी.''  केवळ सांपत्तिकदृष्ट्या पाहता रामजीबाबा हे आपल्या वडिलांपेक्षाही अधिक संभावित व श्रीमंत स्थितीला पोहोचले होते पण पुढे चित्र पालटले.  १८७३ पासून, म्हणजे विठ्ठलाच्या जन्मापासून, पुढची पंधरा-सोळा वर्षे ते जमखंडीच्या यजमानांशी भांडून घरी बसले.  पुढे गांजेकस साधू-बैराग्यांच्या कोंडाळ्यात अडकले.  त्यांनाही नशापाणी करण्याचा नाद लागला.  नोकरी गेल्याने मिळकत थांबली.  उघडपणे मांसाहार करणार्‍या व दारू पिणार्‍या बाबलादीच्या लिंगायत साधूच्या भजनीही ते काही काळ लागले.  ह्या सर्व प्रकारांमुळे रामजीबाबांकडून आपल्या घराची धुळधाण झाली.  मुले अन्नालाही महाग झाली.  शिंदे लिहितात, ''आईची जोड व एक प्रकारचा निर्बंध नसता, तर बाबा आम्हाला कोणावर तरी टाकून बैरागी होऊनही गेले असते.  म्हणून आम्ही सर्वस्वी आईचे ॠणी आहोत.''  शिंदे यांनी आपल्या आईच्या अंगी ही दैवी पात्रता येण्याची तीन कारणे नमुद केली आहे. ''एक, माहेरच्या दारिद्र्यामुळे व बाप लंगडा व आई कर्तृत्वहीन असल्यामुळे त्यांच्या आईचे झालेले हाल, दुसरे वैष्णव ब्राह्मणाचे लागलेले वळण आणि तिसरे, तिला झालेला कठीण सासुरवास.  तिसरा जो सासुरवास त्याच्या गोष्टी आईने आमच्या लहानपणी उठता-बसता सांगितल्या.  त्या ऐकून कोवळे हृदय करपत होते.''११  विठ्ठल रामजींची आजी म्हणजेच आईची सासू संताबाई ही स्वभावाने खाष्ट, हेकट व सहानुभूतिशून्य आणि पक्षपाती होती.  गरिबीमुळे आईची नणंद अंबाबाई हीही रामजीबाबांच्या घरीच येऊन राहिली होती.  घरचा रयतावा मोठा, आठ बैल तर असतच शिवाय गाई, म्हशी व वासरांचे खिल्लार.  घरकामाचा बोजा त्यांच्या आईवरच पडे.  नणंद होती तिचा उपयोग चहाड्या सांगण्यापुरताच.  घरातील पंधरा-वीस माणसे आणि शिवाय अतिथी, बैरागी, पाहुणे यांचा नेहमी राबता. सकाळी चार वाजल्यापासून दळणाची घरघर सात वाजेपर्यंत चाले.  मग विहिरीतून पाणी आणणे, स्वयंपाक, भांडी, धुणे, जेवण झाल्याबरोबर सूत कातणे.  मग इतक्या बैलांच्या शेणाच्या गोवर्‍या करणे. शिवाय रात्रीचा स्वयंपाक.  या कामात भर म्हणजे सासूच्या छळाची.  सासूच्या ठिकाणी सुनेचे कौतुक करणे तर सोडाच पण माणुसकीने वागविण्याची वृत्ती नसायची.  त्यांच्या आईला एकंदर वीस मुले झाली.  परंतु एकाच वेळी पाचाहून जास्त कधीच नव्हती.  म्हणजे पंधरा मुलांचा शोक त्यांच्या आईला करावा लागला.  आजा-आजी असेतोपर्यंत म्हणजे १८८० पर्यंत त्यांच्या आईला स्वातंत्र्य म्हणजे काय ते माहीत नव्हते.  परंतु आजी गेल्यावर लवकरच घरची सुबत्ताही गेली.  स्वातंत्र्य मिळते न मिळते तोच अठराविश्वे दारिद्र्याने तिला गाठले.  विठ्ठल रामजी म्हणजे आईचा पाचवा मुलगा, सातवी मुलगी जनाक्का ही घरातील पहिलीच मुलगी.  म्हणून ती सगळ्यांची लाडकी होती.  विठ्ठल रामजींचा मोठा भाऊ १८८५ साली पावसाळ्यात पटकीने वारला.  त्यांची राहती जागा ही आरोग्याला अत्यंत प्रतिकूल कशी होती ह्याचे बारीक तपशिलाने वर्णन केल्यानंतर शिंदे लिहितात, ''अशा स्थितीत इतकी मुले लहानपणीच वारली हे आश्चर्य नसून आम्ही पाच-सातजण कसे वाचलो हेच आश्चर्य होय.''१२

दर दुसर्‍या वर्षी विठ्ठल रामजींच्या आईचे बाळंतपण ठरलेले असे आणि त्या वेळी मागले मूल काहीं जिवंत नसे.  बाळंतपण, मुलांचा आजार किंवा मृत्यू या खाली त्यांच्या आईची सर्व शक्ती खचली.  पण मुलांचा कंटाळा किंवा संसाराचा तिटकारा, किंबहुना दुःखाचा किंवा निराशेचा एक उद्‍गारही कधी त्यांच्या आईच्या तोंडातून मुलांच्या कानावर आला नाही.  आपल्या आईबद्दल शिंदे लिहितात, ''दारिद्र्याच्या असह्य वेदना, नवर्‍याचा रागीट स्वभाव व मुलांचा जोजार सोसूनही आम्हा लहानग्यांना नेहमी आपल्या माहेरच्या सुखदुःखाच्या गोष्टी रसिकपणाने सांगून आई आमची गोड करमणूक करीत असे.  आईच्या गोष्टी व गाणी हाच आमचा मोठा मेवा होता.  तिची आनंदी आणि विनोदी वृत्ती हीच आमची विश्रांती होती.  तिच्या गोष्टींची आम्हाला पुढे पुढे चटक लागली.  इतकी की, जर भूक लागली असली, स्वयंपाकाला अवकाश असला, किंबहुना भाकरीबरोबर खावयास चांगली भाजी नसली, तर आम्ही आईच्या काठवटीभोवती जमून तिला गोष्टी सांगण्यास लावीत असू.  मग तिने आम्हास अशा प्रेमळ कहाणीत गुंतवावे की, स्वयंपाक केव्हा झाला, आम्ही काही खाल्ले की मुळीच काही खाल्ले नाही याचे आम्हास भान राहात नसे.  बाबा एखाद्या वेळी रात्री उशिरा आले की, आमच्या गोष्टींची मेजवानी लांबे !  केव्हा केव्हा आम्ही वन्समोअरही म्हणत असून !  एकंदर आईच आमची खेळगडी होती.''१३  अत्यंत दारिद्र्याच्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतःची आत्मसंतुष्ट वृत्ती टिकवून मुलांच्याही ठिकाणी जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती निर्माण करण्याची थोरवी विठ्ठल रामजींच्या आईच्या ठिकाणी होती.  कितीही त्रास असो व कसलाही प्रसंग येवो, बाबा घरी असोत-नसोत आई आम्हा चौघा पिलांस एखाद्या पक्षिणीप्रमाणे पंखाखाली घेऊन आनंदाने बसे व आम्हालाही तिच्या पंखाशिवाय दुसरा आसरा नको असे.  विठ्ठल रामजींचे आजा-आजी असेतोपर्यंत ज्या वाड्यात मोठ्या दणक्याने रयतावा चालत असे तेथे त्यांच्या मागे थोड्याच वर्षांत सर्व वैभव होरपळून रानात शेत नाही, गोठ्यात गुरे नाहीत, घरात माणसे नाहीत अशी ओसाड स्थिती झाली, तरी बाबांना संसाराची काळजी म्हणून कसली ती लागली नाही किंवा आईच्या स्वभावात कडूपणाची छटा कधी दिसून आली नाही.  आईबापाच्या ह्या संतोषी वृत्तीचे संस्कार विठ्ठल रामजींच्या मनावर झाले.  दारिद्र्याच्या ह्या अत्यंत वेदनादायक काळात विठ्ठल रामजींना आणि त्यांच्या भावंडांना कुणी तारले असेल व सुसंस्कारित केले असेल तर ते त्यांच्या आईने.  तिच्या सासूचा स्वभाव कडक आणि सहानुभूतिशून्य असल्यामुळे यमुनाबाईंना कठोर सासुरवास सोसावा लागला.  शिंदे सांगतात, ''आपण भोगलेल्या त्रासाचे मासले ती आम्हास बालपणी सांगू लागली, म्हणजे आमच्या कोमल अंतःकरणाला घरेच पडत.''  विठ्ठल रामजी असेही नमूद करतात की, ''माझ्याकडे पुढे पुढे जे स्त्री-दाक्षिण्य आणि हिंदू विवाहपद्धतीसंबंधी कायमची तेढ उत्पन्न झाली, तिचे पहिले बीज ह्या आईच्या खडतर सासुरवासातच आहे.''१४ निसर्गाच्याही आधी आपण पहिले हृदयदान दिले ते आईला असे ते म्हणतात.  एकंदरीतच स्त्रीवर्गाबद्दल त्यांच्या मनामध्ये अतीव आदराची जी भावना निर्माण झाली होती तिचा उद्‍गम त्यांच्या मातृप्रेमातच आहे.  त्यांच्या मातोश्रींच्या आद्य श्राद्धानिमित्त स्त्रीची अनेक अंगांनी महती वर्णन केलेली आहे.  स्त्रीच्या ठिकाणी अपूर्व शक्ती आहे.  ती म्हणजे तिची सहनशीलता.  ''ह्या सहनशीलतेच्या द्वारे स्त्री पती, पुत्र आणि पिता ह्या तिघांची आज्ञा पाळते.  इतकेच नव्हे तर ती त्यांचे लळेही पाळिते.  वरवर पाहणार्‍यास ती पती आणि पिता ह्यांची आज्ञा पाळते असे दिसेल, पण खोल पाहिल्यास ती त्यांचे लळे पाळिते असे दिसेल.''१५  स्त्रीच्या थोरवीचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अशा प्रकारे आकलन केलेले दिसते.  स्त्रीची थोरवी केवळ माता ह्या नात्यापुरती मर्यादित नाही.  पती, पिता, पुत्रादिकांचे ती सर्वच काळी अपराध सहन करते.  शुश्रूषा करते आणि लाड पुरविते.  म्हणून ती सर्वांची सारखीच माता म्हणावयाची.  तर आपण केवळ 'मातृदेवोभव' असे न म्हणता 'स्त्रीदेवोभव' असे म्हटले पाहिजे, असे ते सांगतात.  त्यांना स्त्रीची मती जी जाणवली ती आपल्या आईमुळेच.  म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत त्यांच्या आईचा फार मोठा वाटा आहे.  समग्र स्त्रीजातीबद्दल त्यांच्या मनात जी अपरंपार करुणा व कोवळीक भरून राहिलेली जाणवते तिचा उगम त्यांच्या आईबद्दल निर्माण झालेल्या आदराच्या, भक्तीच्या भावनेत आहे असे म्हणता येते.

संदर्भ
१.  रा. द. रानडे इ. (संपा), जमखंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव स्मारक ग्रंथ, चिटणीस, सुवर्ण महोत्सव स्मारक ग्रंथ मंडळ, जमखंडी, १९३८, पृ. २६०.
२.  विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २.
३.  तत्रैव, पृ. ७-८.
४.  तत्रैव, पृ. १३.
५.  तत्रैव, पृ. ११.
६.  जनाबाई शिंदे, 'स्मृतिचित्रे', साप्‍ताहिक.  तरुण महाराष्ट्र, पुणे, ७.१.१९४९.
७.  तत्रैव, ७.१.१९४९.
८.  विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १७.
९.  तत्रैव, पृ. १६.
१०. तत्रैव, पृ. १८.
११. तत्रैव, पृ. २०-२१
१२. तत्रैव, पृ. २४.
१३. तत्रैव, पृ. २४.
१४. तत्रैव, पृ. ११.
१५. विठ्ठल रामजी शिंदे, धर्म, जीवन व तत्त्वज्ञान, (संपा.) मा. प. मंगुडकर, इ., समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९७९, पृ. ३९१.

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न

भारतात आणि महाराष्ट्रात इंग्रजी राजवट सुरू झाल्यानंतर येथे राजकीय व्यवस्थेत तर बदल झालेच; शिवाय ह्या नवीन इंग्रजी राजवटीचे आघात येथील सनातन अशा धर्मसंस्थेवर तसेच समाजव्यवस्थेवरही होऊ लागले. इंग्रजी शिक्षणाचा परिचय झालेली नवी पिढी अंतर्मुख होऊन आपल्या धार्मिक, सामाजिक जीवनाचा पुनर्विचार करू लागली व त्यामध्ये आढळून येणारी वैगुण्ये दूर करावी अशा प्रयत्नास लागली. समाजिक बाबतीतही सर्वात महत्त्वाची अशी बाब म्हणजे अस्पृश्यतानिवारणकार्याचा अग्र मान जोतीबा फुले ह्यांच्यारूपाने महाराष्ट्रासच मिळाला असे शिंदे ह्यांनी नमूद केले ते रास्तच आहे. जोतीबा फुले ह्यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि १८५२च्या आरंभी महार-मांगांच्या मुलांसाठी पहिली शाळा स्थापन केली. ही शाळा मुंबई इलाख्यातच नव्हे तर अखिल भारताच्या इतिहासात अस्पृश्यांसाठी एका हिंदूने उघडलेली पहिली शाळा होय. सरकारी इन्स्पेक्टर मेजर कॅन्डीसाहेब ह्यांनी ह्या शाळेची परीक्षा घेऊन दिलेला अभप्राय २१ मार्च १८५२च्या ज्ञानप्रकाशच्या अंकात प्रसिद्ध झाला. “ह्या वेळेस शुद्ध लिहिणे व वाचणे वगैरे गोष्टींत ह्या शाळेतील मुलांनी विश्रामबागेतील (वरिष्ठवर्गाच्या) कित्येक मुलांपेक्षाही उत्तम परीक्षा दिली, असे मेजर साहेबांनी बोलून दाखविले.” ५ डिसेंबर १८५२च्या ज्ञानप्रकाशात पहिल्या वार्षिक रिपोर्टासंबंधाने संपादकांनी आपले मत दिले आहे, “त्यांनी एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ काढली. त्या कालावधीत व पुढेही त्यांना त्यांच्या जातीकडून फार त्रास सोसावा लागला. त्यांस शेवटी त्यांच्या तीर्थरूपांनी त्याच कारणावरून घरातून बाहेर काढले. आपल्या नीच मानलेल्या बंधुजनांस अज्ञानसागरातून काढून ज्ञानामृताचे सेवन देण्याकरिता त्यांनी संकटे भोगली हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे. आम्हीही त्यांचे आभार मानतो.” ह्या शाळेत चांभाराच्या मुलींना स्वतः जोतीबा व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई किती कळकळीने शिकवीत असत ह्याविषयी एक पत्र ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झाले आहे. “त्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि सखाराम यशवंत परांजपे ह्यांची जोतीबांना बरीच मदत असे. महारा-मांगांच्या शाळांत बरीच गर्दी होत असे. ह्या लोकांस त्यांनी आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली होती.”१ अस्पृश्य मानलेल्या वर्गातील मुलांना शिक्षण देण्याचा व आपल्या घरातील विहिरीवर पाणी भरण्याची ह्या लोकांना परवानगी देऊन सामाजिक स्वरूपाच्या अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याचा महात्मा जोतीबा फुले ह्यांचा हा प्रयत्न हिंदुस्थानच्या समाजव्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचा युगप्रवर्तक प्रयत्न म्हणावा लागेल.

बंगालमध्ये अस्पृश्यतानिवारण करण्याच्या कामाचा प्रारंभ बाबू शशिपाद बानर्जी ह्यांनी केला. बंगालमधील हावडा जिल्ह्यातील राबानगर येथे १८६४ मध्ये बानर्जींच्या प्रेरणेनेच ब्राह्मसमाजाची स्थापना झाली. त्यांचा जन्म १८४० मध्ये कुलीन ब्राह्मण जातीत झाला. त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ केला. बारानगर येथील मजुरांसाठी त्यांनी रात्रीच्या व दिवसाच्या शाळा काढल्या. शशिपाद बानर्जींच्या ह्या कामापेक्षा आणखी महत्त्वाचे काम म्हणजे स्वतः वर्तनाच्या द्वारा अस्पृश्यता नष्ट करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न. अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांमध्ये ते मोकळेपणाने मिसळत. मेहतरांसारख्या जातीतील अस्पृश्यांची प्रत्यक्ष ते सेवा करीत. त्यांच्यासारखा उच्चवर्णीय ब्राह्मण त्या वेळेस अस्पृश्य ठरविल्या गेलेल्या आपल्यासारख्या माणसांच्या घरात आपल्याबरोबर जेवतो, गप्पागोष्टी करतो ह्यामुळे त्या वर्गातील लोकांना आपला बहुमान झाल्यासारखा वाटे. पं. शिवनाथशास्त्री ह्यांनी साधारण ब्राह्मसमाजाच्या १८७८च्या अहवालात तसेच मिस् कॉलेट ह्यांनी १८८०च्या वार्षिक पुस्तकामध्ये बाबू शशिपाद बानर्जी ह्यांनी बारानगर येथील ब्राह्मसमाजाच्या चालविलेल्या कार्याची माहिती दिली आहे. “सामाजिक सुधारणा मंडळी, सार्वजनिक वाचनालय आणि रात्रशाळा ह्या संस्थांचे व्यवस्थापना ज्यूट मिल्स कंपनीकडे असले तरी ब्राह्मसमाजाच्या द्वारा व बाबू शशिपाद बानर्जी ह्यांच्या प्रयत्नांमुळेच ह्या संस्था अस्तित्वात आल्या असल्या पाहिजे.”२ मजूरवर्गात असलेले मद्यपानाचे व्यसन सुटावे ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एकंदरीत मजूरवर्गाची शैक्षणिक, नैतिक सुधारणा व्हावी ह्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. अस्पृश्यता नष्ट करण्याचा जोतीबा फुले ह्यांच्या प्रयत्नानंतरचा महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे शशिपाद बानर्जी ह्यांचाच होय.

१८७० मध्ये ब्रह्मानंद केशवचंद्र सेन हे विलायतेहून परत आले व त्यांनी मुंबईतील फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूटमध्ये एक व्याख्यान दिले. ह्या व्याख्यानात त्यांनी खालच्या जातीच्या उन्नतीसाठी मुंबई प्रार्थनासमाजाने काही कार्य करावे अशी सूचना दिली. त्या सूचनेला अनुसरून मुंबईच्या थीइस्टिक असोसिएशनने रात्रीच्या शाळा सुरू केल्या. मुंबई प्रार्थनासमाजाच्या पुढारी मंडळींनी असोसिएशनच्या ह्या कामात लक्ष घातले. प्रार्थनासमाजाचे प्रथम आचार्य श्री. भिकोबादादा चव्हाण ह्यांच्या पुढाकाराने १८७६ मध्ये चेऊलवाडी येथे मजूवर्गासाठी पहिली रात्रीची शाळा काढण्यात आली होती. अशा ५ शाळा असोसिएशनच्या वतीने चालविल्या जात असत. १८९० मध्ये महार-चांभार ह्या अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांकरिता मदनपु-यात एक स्वतंत्र शाळा उघडण्यात आली. १८९९ पासून थीइस्टिक असोसिएशन बंद पडल्यामुळे ह्या शाळांची व्यवस्था प्रार्थनासमाजाकडे आली. प्रार्थनासमाजाच्या वतीने दुसरी शाळा भायखळा येथे अस्पृश्यवर्गासाठी चालविण्यात येत असे.३

अस्पृश्यतानिवारणाचा प्रयत्न करणा-यांत श्रीमंत सयाजीरावमहाराज ह्यांचा कालानुक्रमाने तिसरा क्रमांक लागतो. १८८३ पासून सयाजीरावमहाराजांनी अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मोफत शाळा उघडण्यास सुरुवात केली. १८८४ मध्ये सात व १८९१ मध्ये दहा शाळा झाल्या. हिंदू शिक्षक मिळत नसल्याने मुसलमान शिक्षकांवर त्यांना काम चालवावे लागले. १९०६ पर्यंत बडोदा संस्थानात अस्पृश्यवर्गासाठी २२ शाळा चालविल्या. वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांची सोय केली व एकंदर १५०० अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. १९१० साली तर सयाजीरावमहाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला व त्यामुळे चित्र पालटून गेले. अंत्यज शाळांची संख्या २२ची २२८ झाली. अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या साडेपंधरा हजारांपर्यंत गेली. सुदैवाने पं. आत्मारामजी ह्या आर्यसमाजी कार्याकर्त्याने देखरेखीची जबाबदारी उचलली. अंत्यजवर्गाची धर्मकृत्ये करणा-या गरोडा ह्या त्यांच्या पुरोहित जातीच्या लोकांना धर्मकृत्ये संस्कृतमधून करता यावीत यासाठी संस्कृत शाळा उघडल्या. बडोदा, अमरेली, पाटण येथे अस्पृश्य मुलांसाठी तसेच मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढली. पुढे श्री. भीमराव आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीत पीएच. डी. चा अभ्यास करण्यासाठी स्कॉलशिप दिली. लोकमताला आणि विरोधाला न जुमानता महाराजांनी हे काम नेटाने केले. सयाजीराव गायकवाड अस्पृश्य विद्यार्थ्यांन नुसते शिक्षण देऊनच थांबले नाही तर त्यांनी विविध खात्यांमध्ये नोक-याही दिल्या. १९११ साली शिक्षणखात्यात २००, लष्करात १९, म्युनिसिपालटीत १०, पोलिसांत ७, सर्व्हे खात्यात ३ आणि इतर ३ अशा एकंदर ३४२ अस्पृश्य व्यक्तींना सरकारी नोक-या दिल्या. विठ्ठल रामजी शिंदे हे १९०३ सालच्या अखेरीस विलायतेहू परतल्यानंतर अस्पृश्यवर्गांच्या शाळांची तपासणी करून अभिप्राय कळविण्याची कामगिरी महाराजांनी त्यांच्यावर सोपविली होती, ह्याचा उल्लेख पूर्वी आलेलाच आहे. महाराजांनी सुरू केलेले हे काम शिंदे ह्यांनाही प्रोत्साहक ठरले व अखिल भारतातील ब्राह्मधर्मप्रचारकार्य करीत असताना निरनिराळ्या प्रांतातील अस्पृश्यवर्गीयांची स्थिती निरखावी अशी प्रेरणा त्यांना ह्या कामामुळे मिळाली, असे त्यांनी स्वतः नमूद केले आहे.४

थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष कर्नल अल्कॉट यांनी अस्पृश्यतानिवारणाचा आणि त्यांची उन्नती करण्याचा उत्तम मार्ग म्हणून १८९४ मध्ये मद्रास शहरात अंत्यजवर्गासाठी पहिली शाळा एका झोपडीमध्ये काढली. १८९८ व १८९९ मध्ये आणखी दोन शाळा उघडल्या. १९०० सालामध्ये सर्व शाळांमधून ३८४ मुलगे, १५० मुली शिकत होत्या व १६ शिक्षक काम करीत होते. चवथ्या इयत्तेपर्यंत ह्या मुलांना हिशेब व व्यावहारिक इंग्रजी हे विषय शिकविले जात. १९०३ सालच्या अखेरीस विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मद्रास शहरात सोसायटीने चालविलेल्या ४ नमुनेदार शाळा पाहिल्या.

दक्षिण भारतात अस्पृश्यवर्गाच्या शिक्षणासाठी व उन्नतीसाठी कार्य करणारे एक थोर सद्गृहस्थ म्हणजे के. रंगराव हे होत. केरळ प्रांती अस्पृश्यवर्गाचे विशेष हाल होत असत. मंगळूर ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी के. रंगराव ह्यांनी मंगळूर येथील आपली पहिली शाळा १८९७ मध्ये काढली. के. रंगराव हे स्वतः सारस्वत जातीचे गृहस्थ होते. अस्पृश्यवर्गासाठी ते काम करू लागल्यामुळे लोकांकडून त्यांना अतोनात छळ सहन करावा लागला. मात्र लोकविरोधाला न जुमानता त्यांनी आपल्या संस्थेसाठी विस्तीर्ण जागा मिळवून इमारत बांधली. तसेच शाळेच्या जोडीने उद्योगशाळाही सुरू केली.

ब्रिटिश सरकार आणि ख्रिस्ती मिशने ह्यांनी अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याचे काहीएक प्रयत्न केले. परंतु सरकारच्या प्रयत्नाला नोकरशाहीचा अडथळा असे आणि धर्मांतराचा ध्यास हा मिशन-यांच्या कामातील अडथळा ठरत होता. मद्रासकडील ख्रिस्ती
मिशन-यांमध्ये तर शिंदे ह्यांना मोठाच दोष आढळून आला. ह्या रोमन कॅथॉलिक
मिशन-यांनी अस्पृश्यांना धर्मांतर करून ख्रिस्ती धर्मात घेऊनसुद्धा अतिनीच अवस्थेतच ठेवले. ख्रिस्ती देवळात जाण्याचा त्यांना मज्जावच असे. ख्रिस्ती मिशन-यांचे काम जरी उदात्त हेतूने प्रेरित झालेले असले तरी त्यांच्या अस्पृश्यांसंबंधी कामाकडे हिंदू धर्मीय लोक विश्वासाने पाहू शकत नव्हते व अनेक अस्पृश्यांना धर्मांतर करूनसुद्धा लौकिक पातळीवर फायदा झाल्याचे अनुभवास येत नव्हते.

अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारण्याचे स्पृश्यवर्गातील पुढा-यांनी जे प्रयत्न केले ते वरीलप्रमाणे. ह्या बाबतीत स्वतः अस्पृश्यांनीसुद्धा आत्मोद्धाराची चळवळ केली. अशी चळवळ करणा-यांमध्ये कोकणातील गोपाळबाबा कृष्णाजी वलंगकर हे आरंभीचे एक मुख्य पुढारी होते. १८८६ मध्ये ते पलटणीतून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. ते म. जोतीबा फुले यांचे शिष्य होते. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी दापोली येथे ‘अनार्यदोषपरिहार समाज’ स्थापन केला. आर्य म्हणविणा-या हिंदूंनी अस्पृश्यांवर कशी बंधने लादली याबद्दल ते धर्मग्रंथ व पुराणे यांचा आधार घेऊन लेख लिहून भाषणे करून जागृत करीत असत. ह्याच विषयावर त्यांनी विटाळविध्वंसन अथवा विनंतीपत्र या नावाची एक पुस्तिका लिहिली.५ गोपाळबाबा वलंगकर हे विशेषतः प्रसिद्ध आहेत ते १८९३च्या अथवा १८९४च्या अर्जामुळे. इंग्रज सरकारने महार जातीतील लोकांची पलटणीत भरती करण्याचे थांबविले होते. ती लष्करभरती पुन्हा सुरू करावी यासाठी त्यांनी न्या. रानडे यांच्या साहाय्याने एक मोठा अर्ज तयार केला होता. ‘पण सैन्यातील निवृत्त झालेल्या महार अधिका-याच्या सह्यांच्या अभावी तो पाठविला नाही.’६ शतकानुशतकाच्या दडपणामुळे ह्या वर्गाची मनोवृत्ती कशी भित्री बनली होती याचे हे ढोबळ उदाहरण आहे. उच्चवर्णीय हिंदू असोत की, परकीय राज्यकर्ते इंग्रज असोत, ह्या वर्गातील लोक घाबरून वागत होते. शतकानुशतकाच्या रूढींचा त्यांच्या मनावर प्रचंड दाब होता. मोहपा (नागपूर) येथील अस्पृश्यवर्गाचे पुढारी किसन फागुजी बनसोडे हे पोस्टल मिशनची पुस्तके वाचून प्रार्थनासमाजाकडे वळले. १९०५च्या समाजाच्या उत्सवाला ते आले होते. पंधरा दिवसांच्या पाहुणचारात येथील मंडळींच्या हेतूंची व प्रयत्नांची त्यांना माहिती झाली. उत्सवाच्या अखेरच्या प्रीतिभोजनालाही हजर होते. यांनी ‘सोमवंशीय हितचिंतक समाज’ ही संस्था अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्थापन केली व महाराष्ट्रात सर्वत्र अशा प्रकारचे प्रयत्न व्हावेत या दृष्टीने काम चालू होते. आपल्या वर्गाच्या उद्धाराचे काम वरिष्ठवर्गाची मने न दुखाविता करीत राहावे; ह्या भूमिकेतून त्यांनी आपल्या अस्पृश्यवर्गाच्या उद्धाराचे प्रयत्न चालविले होते. अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात(बटलर), पांडुरंग लक्ष्मण डांगळे हेडमास्तर, रावजी सदोबा गायकवाड शिक्षक, पुण्याचे शिवराम जानबा कांबळे हे अस्पृश्यवर्गीय पुढारी मोहपा येथील सोमवंशी हितचिंतक समाज ह्या संस्थेपासून प्रेरणा घेऊन आपल्या समाजाच्या उद्धाराचे कार्य करीत होते. अस्पृश्यवर्गीय पुढा-यांकडून आपल्या वर्गाच्या उन्नतीचे जे काम चालले होते ते प्राधान्याने शालेय शिक्षण देण्याचे व आपल्या लोकांना वाईट सवयीचा त्याग करावयास लावून त्यांच्या अंगी उत्तम नागरी गुण बाणविण्याचे. हे प्रयत्न प्रामुख्याने स्थानिक पातळीवरचे होते. समाजामध्ये अस्पृश्यता पाळली जात असल्याने ह्या वर्गावर जो अन्याय होतो, त्यांना जो छळ सहन करावा लागतो, त्याविरुद्ध म्हणजे सामाजिक अस्पृश्यतेच्या विरुद्ध चळवळ करण्याचे धैर्य मात्र अद्यापि त्या लोकांमध्ये निर्माण झाले नव्हते आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळचा धार्मिक रूढीचा प्रचंड प्रभाव व त्यामुळे अस्तित्वात असलेले सामाजिक दडपणाचे वातावरण पाहता अस्पृश्य मानलेल्या वर्गातून असे धैर्य असणारा पुढारी उदयाला येणे संभवनीय नव्हते.

बहुसंख्य अशा स्पृश्यवर्गाच्या मनात पालट घडवून आणण्याचे काम ह्या काळात स्पृश्यवर्गातील कर्तबगार व्यक्तीनेच हाती घेणे आवश्यक होते.

विठ्ठल रामजी शिंदे हे या कामासाठी पुढे आले. स्पृश्यांच्या मनात असणारी अस्पृश्यतेची भ्रामक कल्पना नष्ट करून, पर्यायाने सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करून, दोन्ही वर्गांना एकाच पातळीवर आणणे त्यांना न्यायाच्या, धर्माच्या, समतेच्या व माणुसकीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक वाटत होते.

संदर्भ
१.    अ. ए. गवंडी, फुलेचरित्र, पृ. ८.
२.    व्ही. आर्. शिंदे, दि थीइस्टिक डिरेक्टरी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, मुंबई, १९१२, पृ. १६.
३.    द्वा. गो. वैद्य प्रार्थनासमाजाचा इतिहास, पृ. ११३.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २१०-२११.
५.    गोपाळबाबा वलंगकर, विटाळविध्वंसन, प्रथम प्रसिद्धी मौजे रावढूळ, जि. कुलाबा, १८८९, (संपा.) रोझॅलिंड ओ’हॅन्लन, डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, ‘प्रस्तावना,’ पृ. ४.
६.    श्री. वसंत मून यांनी रोझॅलिंड ओ’हॅन्लन यांना पत्राने कळविलेली माहिती. उदधृत, तत्रैव, पृ. ८.

  1. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीची दिशा व मार्ग
  2. अस्पृश्यवर्गाचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व
  3. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधींजी संबंध
  4. अस्पृश्यतानिवारक परिषद
  • 120
  • 121
  • 122
  • 123
  • 124
  • 125
  • 126
  • 127
  • 128
  • 129
Page 125 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी