मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत

विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या उन्नतीचे कार्य हाती घेतले होते ते धर्मकार्य म्हणूनच. त्यासाठी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम मोठे जोरात चालले असताना शिंदे यांच्या आयुष्यातील पहिली शोकात्म घटना घडली. ती म्हणजे, ज्या प्रार्थनासमाजाचे ते आंतरिक प्रेरणेने प्रचारक बनले होते, त्याच्याशी त्यांचा क्रमशः दुराव निर्माण होत गेला व अंतिमतः त्याचे पर्यवसान प्रार्थनासमाजाशी त्यांचे असलेले संबंध संपुष्टात येण्यात झाले. ज्या प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद अत्यल्प वेतनावर पत्करून आयुष्यभर धर्मप्रचाराचे काम करण्याचा निर्णय त्यांनी स्वार्थत्यागपूर्वक घेतला होता, त्याच्याशी त्यांचा प्रचारक या नात्याने असलेला संबंध कायमचा संपुष्टात आला. एवढेच नव्हे, तर पुढील काळात विठ्ठल रामजी शिंदे यांची दखल घेण्याचेच मुंबई प्रार्थनासमाजाने बंद केले. प्रार्थनासमाजासी वियुक्त होण्याचा हा प्रसंग शिंदे यांनी मोठ्या धैर्याने सहन केला. याची प्रमुख दोन कारणे संभवतात. एक म्हणजे, परमेश्वरावर असलेला त्यांचा अढळ विश्वास व दुसरे, आपण अस्पृश्यतानिवारणाचे जे कार्य करी आहोत ते ईश्वराचेच काम आहे, ते धर्मकार्यच होय ही त्यांची दृढ श्रद्धा.

मुंबई प्रार्थनासमाज व विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला त्याची कारणे मुख्यतः मुंबई प्रार्थनासमाजातील मंडळींचै सामाजिक सुधारणेबद्दल असणारा दृष्टिकोण व त्यांची कार्यपद्धती यामध्येच पाहावा लागतो. शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या कार्यात जी धडाडी दाखविली व त्यांनी त्या कामात स्वतःला जे झोकून दिले ते प्रार्थनासमाजीय मंडळींना फारसे भावण्याजोगे नव्हते. वस्तुतः अस्पृश्य मानलेल्या वर्गाबद्दल प्रार्थनासमाजीय मंडळींना कळकळ होती व त्यांची सुधारणा व्हावी, त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांच्या ठिकाणी उन्नत धर्मबुद्धी जागृत करावी असे प्रार्थनासमाजातील धुरिणांना वाटत होते खरे; मात्र याबाबतीत प्रत्यक्ष कृती करण्याच्या संदर्भात त्यांचे धोरण मवाळ, सावधपणाचे होते. लोकांकडून आक्षेप येणार नाही, प्रवाद निर्माण होणार नाही याची ही मंडळी नेहमी दक्षता घेत होती. मुंबई प्रार्थनासमाजाने दिवसा नोकरीधंदा करणा-यांसाठी काही रात्रीच्या शाळा १८७६ मध्ये उघडल्या होत्या. १८९० मध्ये महार, चांभार वगैरे जातींच्या लोकांकरिता मदनपु-यात एक स्वतंत्र शाळा स्थापन करण्यात आली होती. श्री. बाबण बापू कोरगावकर यांच्या प्रेरणेने ही शाळा स्थापन करण्यात आली होती. मुंबई म्युनिसिपालटीत ड्रेनेज खात्यात काम करणा-या एकजणाला बढती पाहिजे होती. म्हणून त्याला बढतीचे आमिष दाखवून कोरगावकरांनी त्याच्याकरवी ही शाळा चालविली होती. त्या वेळेला लोकमतच असे होते की, शाळेतील सवर्ण मुलांची अस्पृश्यवर्गीय मुलांबरोबर खाऊ स्वीकारण्याचीही तयारी नव्हती. त्या वेळच्या वातावरणाची कल्पना एका प्रसंगावरून येऊ शकते. समाजाच्या वार्षिक उत्सवामध्ये रात्रीच्या शाळेतील मुलांच्या बक्षीस समारंभात सर्वांना एकत्र करून त्यांना उपदेश करून मिठाई वाटण्याची पद्धत होती. अस्पृश्य शाळेतील विद्यार्थांस वेदीच्या उजव्या बाजूस बसविण्यात आले. रात्रशाळेच्या स्पृश्य मुलांना वेदीच् डाव्या बाजूस बसलेल्या काही स्पृश्य विद्यार्थ्यांनी मिठाई घेतली नाही, तर घेतलेल्यांनी ती फेकून दिली.ही घटना १८९० मधली.१ याघटनेवरून अस्पृश्यांकडे बघण्याचा स्पृश्यांचा दृष्टिकोण कस अवहेलनेचा होता याची कल्पना येऊ शकते. अस्पृश्यांसमवेत भोजन करणे, त्यांना स्पर्श करणे ह्या गोष्टी तर अमलात आणण्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते.

उन्नत धर्माच्या प्रसारकार्यामध्ये अस्पृश्यवर्गीयांना सामील करून घ्यावे, त्यांच्यापर्यंत ब्राह्मधर्माचा संदेश पोहोचवावा असे सातारा प्रार्थनासमाजाचे जुने कार्यकर्ते श्री. सीताराम यादवराव जव्हेरे यांना कळकळीने वाटत होते व ह्या मंडळींना ब्राह्म समाजाच्या अनेक स्थानीय समाजांपैकी सातारा येथील श्री. जव्हेरेंचे कार्य हे या दृष्टीने मोलाचे होते. मात्र धर्मविषयक प्रवचन ऐकण्यासाठी अस्पृवर्गायांना एकत्र जमविणे ह्यापलीकडे जाऊन अस्पृश्यतानिवारण्याचे काम करण्यापर्यंत सातारा प्रार्थनासमाजाचीही मजल जाऊ शकत नाव्हती. एकंदरीतच मुंबई प्रर्थनासमाजाने अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी चालविलेले हे काम मुंगीच्या गतीनेच चालले होते असे म्हणावे लागेल. ह्याला कारण अस्पृश्यतेच्या संदर्भात असलेले त्या काळातील लोकमत. ह्या लोकमताला मान देण्याची प्रार्थनासमाजीय धुरिणांची असलेली वृत्ती होय. आपल्या मताचा प्राभाव समाजावर पाडून समाजाला आपल्या मताकडे ओढू घ्यावे, त्यांनी आपले अनुयायी करावे व समाजमनामध्ये पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा ही धडाडी ह्या धुरिणांमध्ये नव्हती.

न्या. रानडे यांच्यासारखा लोकोत्तर पुरुषाची एकंदरीत सामाजिक सुधारणेबद्दल मनोवृत्ती काय होती हे पाहिले असता प्रार्थनासमाजाच्या दृष्टिकोणाचीही आपल्याला कल्पना येऊ शकते. पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या वतीने धर्मविषयक व अन्य महत्त्वाच्या प्रश्नांबाबतची चर्चा करण्यासाठी संगतसभा भरत असे. १८८०-८१ मध्ये ह्या संगतसभेत झालेल्या चर्चेला पुढील वृत्तात द्वा. गो. वैद्य यांनी प्रार्थनासमादाचा इतिहास ह्या आपल्या पुस्तकात उदधृत केला आहे.

वडिलांच्यासंबंधाने व परस्परांसंबंधाने कर्तव्ये इत्यादी
बळवंतराव गोडबोलेः अमुक एक गोष्ट अशा प्रकारची आहे, तिच्यासंबंधाने आपण अशा रीतीने वागणे अगर न वागणे हे आपले कर्तव्य आहे व त्याप्रमाणे वागल्यास अगर न वागल्यास परमेश्वराचे आपण दोषी होऊ, अशा रीतीची आपली खात्री झाल्यावर आपल्या वडिलांची समजूत आपल्याहून निराळी आहे, यामुळे आपल्या अशा वागण्याने अथवा न वागण्याने त्यां वाईट वाटणार आहे अशा आपत्तीचे प्रसंगी आपण केवळ वडिलांस संतोषविण्याकरिता आपल्या समजुतीविरुद्ध त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणे हाच आपला धर्म आहे की काय?

रा. ब. रानडेः आपली समजूत जरी एक प्रकारची झाली, तरी तिजप्रमाणे आपण एकदम आचरण करू नये. त्या समजुतीप्रमाणे आपले विचार आहेत असे बोलावे. आपल्याप्रमाणे आपल्या वडिलांचे व दुस-यांचे विचार होण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या विचारांप्रमाणे पुष्कळांचे विचार झाल्यावर त्याप्रमाणे इतरांनी दुस-या काही कारणांनी आचरण न केले तरी आपण करावे. पण जोपर्यंत पुष्कळांची समजूत आपल्या समजुतीहून निराळी आहे तोपर्यंत आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करणे बरोबर नाही.

कित्येक२: प्रत्येकाने आपल्या समजुतीप्रमाणे वागावे. आपल्याहन दुस-याची समजूत निराळी असली तरी ती बदलण्याचा आपण प्रयत्न करावा, परंतु त्यांची समजूत बदलेपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. अशी वाट पाहत राहिल्याने सुधारणेचे पाऊल कधीच पुढे पडावयाचे नाही. प्रत्येक मनुष्य परमेश्वरापाशी आपल्यापुरता बांधलेला आहे.

प्रश्नः अमुक गोष्ट जनसमूहाच्या हितास आवश्यक आहे असे आपल्याला दिसल्यावर व ती न करणे हे ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे असे वाटल्यावर ती जर पुष्कळ लोकांच्या समजुतीविरुद्ध किंवा रूढीविरुद्ध असेल तर ती आपण करावी की नाही?
 
रा. ब. रानडेः ती करतीलते धन्य, पण न करतील ते दोषी नाहीत.

कित्येकः लोकविरुद्ध असली तरी केला असता ती गोष्ट होणे साध्य आहे, अशी स्थिती असल्यास ती करावी हेच धर्मदृष्टीने आपले कर्तव्य; साध्य नसल्यास साध्य होण्याची वेळ नजीक आणण्यासाठी झटणे हे कर्तव्य होय.३

न्या. रानडे यांचा सामाजिक सुधारणा करण्याचा जो दृष्टिकोण ह्या चर्चेतून दिसून येतो तोच सामान्यतः प्रार्थनासमाजाच्या धुरीण मंडळींचा होता.

आपल्याला विचारपूर्वक जे वाटते ते बोलावे व आपण जे बोलतो त्याप्रमाणे कृती करावी असा विठ्ठल रामजी शिंदे यांचा निश्चित स्वरूपाचा दृष्टिकोण होता. म्हणून शिंदे यांचा विद्यार्थिदशेपासून उक्ती व कृतीमध्ये संगती व ऐक्य असावे असा सदैव आग्रह असल्याचे दिसून येते. जेथे ते पाहावयास मिळत नाही तेथे तेथे त्याबद्दल ते नापसंती प्रकट करतात. २९ मे १८९८ रोजी मुंबई प्रार्थनासमाजाबद्दलचा अभिप्राय रोजनिशीत नोंदविताना त्यांनी म्हटले आहे, “समाजाचे (प्रार्थनासमाजात कसल्याही प्रकारचे जातिभेद असता कामा नये, असे असता इतर सुधारकांत व (प्रार्थना) समाजात मला काही भेद दिसत नाही. म्हणजे दोघेही अद्याप जातिभेद उघड उघड झुगारण्यास तयार आहेतसे दिसत नाही.”४ विचाराला कृतीचे जोरदार पाठबळ असल्याशिवाय सुधारणेचे पाऊल पुढे पडणार नाही अशीच कृतिवीर अण्णासाहेब शिंदे यांची भूमिका अखेरपर्यंत होती. १९३७ साली वाई प्रांतातील पसरणी येथील सभेतील भाषणात महात्मा जोतीराव फुले यांच्या कृतियुक्त सुधारणेचा गौरव करताना ते म्हणाले, “त्यांनी निंदा-अपमान सोसून धैर्याने, कृतीने समाजाची सुधारणा घडवून आणली. नुसती व्याख्याने देऊन किंवा जाडे ग्रंथ लिहून, त्यात विचार मांडून सुधारणा होते असे नाही. प्रत्यक्ष विचाराप्रमाणे कृती हवी. तरच सुधारणा घडून येते.”

घरातील जातिभेदविरहित वातावरण आणि वारकरी संप्रदायाचे उदारमतवादी संस्कार यांमुळे, तसेच त्यांच्या ठिकाणच्या विवेकशीलतेमुळे अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण उन्नतीबद्दल शिंदे यांच्या मनात विद्यार्थिदसेपासूनच कळकळ निर्माण झाली होती. त्यांच्या या मनोधारणेला पुढे धर्ममताचाही आधार मिळाला.

“सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्पराशी बंधुभावाने वागावे हे ईश्वरास प्रिय आहे आणि हे मनुष्याचे कर्तव्य आहे,” हे प्रार्थनासमाजाचे एक तत्त्व आहे. हे तत्त्व सत्य म्हणून जर आपण स्वीकारले असेल तर त्याला अनुसरूनच भेदभाव न करता इतरांशी वागावयास पाहिजे असे शिंदे वाटत होते. जातिभेदच काय, अस्पृश्यता पाळणे हे या तत्त्वाशी विसंगत आहे अशी त्यांची श्रद्धा होती. या भूमिकेनुसारच अस्पृश्यत नष्ट करणे व अस्पृश्य बांधवांची उन्नती करणे हे त्यांना धर्मकार्यच वाटत होते. सत्यावर आणि ईश्वरावर शिंदे यांची आत्यंतिक श्रद्धा होती. १९०८ साली मुंबई प्रार्थनासमाजात वार्षिक उत्सवात ‘ईश्वर आणि विश्वास’ ह्या विषयावर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी म्हटले आहे, “ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही, तर तो सत्याचा आणि शुभाचा प्रवर्तक आहे, म्हणूनच मी सत्याचा आग्रह धरून राहिलो तर, माझे कितीही हाल झाले तरी हानी-माझी किंवा कोणाचीही-मुळीच होणार नाही, असा विश्वास पाहिजे.अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा आणि निकट संबंध जडतो, बुद्धीने जडत नाही.”५

महात्मा गांधींचा सत्याबद्दलचा आग्रह त्यांच्या जीवनकार्यातून जस दिसून येतो त्या प्रकारचाच सत्याबद्दलचा आग्रह आणि आपण धर्मकार्य म्हणून जे कार्य स्वीकारले त्यावरील निष्ठा शिंदे यांच्या कार्यातून आणि विचारांतून दिसून येते. आपले कार्य म्हणून जे कार्य स्वीकारले त्यावरील निष्ठा शिंदे यांच्या कार्यातून आणि विचारांतून दिसून येते. आपले कार्य आणि ईश्वरावरील अढळ निष्ठा शिंदे यांच्या ठिकाणी एकरूप झालेल्या होत्या. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य धर्मकार्य म्हणून त्यांनी अत्यंत स्वाभाविकपणे स्वीकारले होते. ते कार्य उताविळीने करावे अशी उत्कंठा त्यांना लागून राहिली होती. समाज काय म्हणेल असा विकल्प त्यांच्या मनात आला नव्हता. उलट समाजमनाचा पालट करून, अस्पृश्यता नष्ट करणे त्यांना निकडीचे वाटत होते. म्हणून त्यांनी ह्या कामाला धाडाडीने हात घातला.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद स्वीकारल्यापासून धर्मकार्याचा झपाट्याने विस्तार केला. प्रांतभरच्या कामामध्ये वेगवेगळ्या शहरांतील स्थानिक प्रार्थनासमाजामध्ये उत्साह निर्माण केला. मुंबई प्रार्थनासमाजात कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने वाचनवर्ग, तरुण ब्राह्मसंघ यांसारख्या चळवळी आणि संस्था सुरू केल्या, हे आपण पाहिले आहेच. या सा-याचा परिणाम म्हणून प्रार्थनासमाजाच्या कार्याबद्दल उत्साहाची भावना सार्वत्रिकपणे निर्माण झाली. १९०६ साली मिशनची स्थापना केल्यानंतर त्याही कामाचा शिंदे यांनी झपाट्याने विस्तार केला. महाराष्ट्रभर अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत अपूर्व जागृती निर्माण होण्यात त्यांच्या कामाचे पर्यवसान झाले. मिशनच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये ते जे दौरे काढत त्यामध्ये प्रार्थनासमाजाच्या प्रचारकार्याच्या जोडीने स्वाभाविकपणेच मिशनचेही कार्य करीत. फरक एवढाच पडलेला असणार की मुंबई शहरातील प्रार्थनासमाजाच्या नैमित्तिक विधिसंस्कारादी कामासाठी ते जितका वेळ देऊ शकत होते तेवढा वेळ देणे शक्य होत नसणार. प्रार्थनासमाजाच्या पगारी प्रचारकाने मिशनच्या कामाचा एवढा उठाव करावा व त्यामध्ये आपली कार्यशक्ती आणि बराचसा वेळ खर्च करावा याबद्दल प्रार्थनासमाजातील काही मंडळींच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. वस्तुतः विठ्ठल रामजी शिंदे व मुंबई प्रार्थनासमाज यांच्यामध्ये हा जो दुरावा निर्माण झाला त्याची कारणे मुंबई प्रार्थनासमाजाच्या मवाळ, पांढरपेशा धोरणाताच पाहावी लागतात. शिंदे यांनी आपल्या खाजगी डायरीत १७ जानेवारी १९३५ रोजी एक नोंद केली आहे. ती अशी, “माझे व मुंबई प्रार्थनासमाजाचे सहकार्य आज जवळ जवळ २०-२५ वर्षे बंद पडले होते. कारण १) राजकारण, २) मी स्वतंत्र ‘अस्पृश्या’ साठी मिशन काढले, ३) माझा स्वतंत्र व सरळ बहाणा.”६

प्रार्थनासमाजाच्या काही पुढारीमंडळींच्या असंतोषाचा परिणाम म्हणून शिंदे यांच्या धर्मविषयक प्रचारकार्यावर नियंत्रण राहावे म्हणून प्रार्थनासमाजाच्या मॅनेजिंग कमिटीने एक पोटकमिटी नेमून स्वतंत्र नियम तयार केले व तिच्या तंत्राने त्यांनी वागावे असा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांच्य स्वतंत्र प्रकृतीला ते पटेनासे झाले. खरे तर पैशाची फारशी तरतूद नसतानाही त्यांनी धर्मकार्याचा जोमाने विस्तार चालविला होताच. अधी काम करावे, मग अनुभव घ्यावा आणि मग योग्य वेळी नियम करावे हा स्वाभाविक क्रम त्यांना बरा वाटत होता. एकीकडे पैशाची तरतूद नाही, दुसरीकडे कामाचा नीट अंदाज नाही अशा स्थितीत शाब्दिक नियमांचे नियंत्रण त्यांना अप्रस्तुत वाटू लागले.

शिंदे यांचे मित्र वासुदेवराव सुखटणकर १९०७च्या सुमारास जर्मनीमध्ये बॉन विद्यापीठात पीएच्. डी. चा अभ्यास करीत होते. शिंदे त्यांना इकडील वर्तमान वस्तुनिष्ठपणे कळवून त्यांचा अभिप्राय मागवीत होते व सुखटणकरही आपले मत मनमोकळेपणाने शिंदे यांना कळवीत असत. प्रचारकाने सभासदाच्या घरी गृहृसंस्कार चालविण्याचे काम ठरविलेल्या संस्कारासंबंधीनेच करावे अशा अर्थाचा एक नियम होता. ब्रह्मसमाजाच्या स्वातंत्र्याला हा नियम बाधक होता म्हणून तो वगळावा असे सुखटणकरांचे मत पडले. शिंदे यांना तर नियमांचा हा सारा घाटच अनावश्यक व चालत्या गाडीला खीळ घालणारा वाटून त्यांचे मन उद्विग्न झाले. शिंदे यांनी आपल्या कामाची डायरी ठेवावी, वरचेवर अहवाल द्यावा वगैरेही अपेक्षा करण्यात येऊ लागल्या. शिंदे डायरी ठेवण्याचे हे काम स्वयंस्फूर्तीने कामाच्या ओघात व कामाचा भाग म्हणूनही पहिल्यापासूनच करीत होते. धर्मकार्यार्थ केलेला प्रचारदौरा, त्यामध्ये व्याख्याने देऊन, उपासना चालवून वगैरे केलेले धर्मसाधन या संबंधीचा भाग सुबोधपत्रिकेमधून वरचेवर प्रसिद्ध होत होता. त्यांच्या या प्रसिद्ध होणा-या वृत्तान्तावरून शिंदे यांच्या प्रचाराचे काम किती सखोलपणे, व्यापक पातळीवर व वरच्या दर्जाने चालले होते याची कल्पना येऊ शकते. परंतु शिंदे यांच्या मिशनच्या कामाबाबत अनुत्साही असलेली प्रार्थनासमाजातील मंडळी असंतुष्टच होती. शिंदे हे स्वयंस्फूर्तीने उत्तम दर्जाचे काम करीत असताना त्यांनी ही कामे अमक्यावेळी व अमक्याच पद्धतीने करावीत हा सुसुरू केलेला नियमाचा जाच त्यांना अनावश्यक वाटू लागला. त्यांचे व समाजा मंडळींचे मतभेद वाढीला लागले.

शिंदे यांच्या निकट नसणारी समाजातील मंडली तर असंतुष्ट होतीच, पण शिंदे यांच्या जिव्हाळ्यातील काही मंडळींनाही शिंदे यांचे धोरण नापसंत होते. श्री. बापू कोरगावकर हे शिंदे यांचे जवळचे स्नेही व खरेखुरे हितचिंतक होते व मनोधारणेने ते एकनिष्ठ ब्राह्म होते. त्यांनीही शिंदे यांना आपला मतभेद पत्राद्वारे कळविला. नाशिक येथील सॅनिटेरियमध्ये कोरगावकर प्रकृतिस्वास्थ्यासाठी १९०७च्या मार्चपासून राहिलेले होते. १९ मे १९०७ रोजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात, “डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कामाचे मला काहीच महत्त्व वाटत नाही, असे तुम्ही म्हणता ते मी कबूल करीत नाही. पण आपल्या वेळाचा तुम्ही अपव्यय करित असे मला वाटते. जे तुम्ही म्हणता ते मात्र खरे आहे. मनुषाचे सामर्थ्य फार परिमित नव्हे तर अत्यंत अल्प आणि समाजोन्नतीची कामे एकापेक्षा एक पडली आहेत की कोणीही मनुष्य एकटा एकही काम नीट करू शकणार नाही. आपल्या (प्रार्थना) समाजाने जी कामे आधीच उचलली आहेत तीच त्यातील कर्तबगार माणसांच्या मानाने त्यास अधिक आहेत, घेतलेली कामे समाधानकारकरीत्या उचलली आहेत तीच त्यातील कर्तबगार माणसांच्या मानाने त्यास अधिक आहेत, घेतलेली कामे समाधानकारकरीत्या चालू राहिल्यास त्यातील सभासदांनी आपली शक्ती दुसरीकडे लावणे बरोबर नाही असे माझे मत आहे. कर्वे, वेलीणकर यांची कामे जशी जोराने चालू आहेत तशी आपल्या समाजाची चालू आहेत असे तुम्हास वाटते काय? डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम तुम्हास अधिक महत्त्वाचे व प्रिय वाटत असेल; परंतु तुम्ही अगोदरच एका सर्वात श्रेष्ठ व इतर सर्व कामास चालना देणारे अशा कामास आपण वाहून घेतले आहे त्याची वाट काय? ब्राह्मधर्मासारख्या सर्वव्यापक धर्माच्या प्रचारकाचे काम जे तुम्ही पत्करले आहे तेच जर नीट कराल तर मला वाटते तुमच्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम करण्यास दुसरी माणसे उत्पन्ना होतील व झाली पाहिजेत. सध्याचा तुमचा मार्ग घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखा दिसतो. ते काही असो, समाजाचे ज्या कामाकरिता तुम्हास नेमले आहे व जे काम करण्याचे तुम्ही स्वीकारले आहे, त्या कामाकडे तुमचा जावा तितका वेळ व लक्ष जात नाही असे मला एकट्याला नव्हे, तर निदार बहुतेक सभासदांस वाटत आहे. मला समाजाचे काम फारच महत्त्वाचे वाटते म्हणून जर मी ऑफिसात जाऊन ऑफिसच्या कामाची हेळसांड करून समाजाचे काम करीत असलो तर तुम्ही मला कामचोर नाही का म्हणणार? आणि माझे असे करणे ईश्वराला तरी आवडले काय? आता तुम्हास असे वाटत असेल की, डिप्रेस्ड क्लास मिशन हे समाजाचेच एक काम आहे, परंतु मी म्हणतो की, याचा निर्णय समाजाने केला पाहिजे, तुम्हास असे वाटून उपयोग नाही, असो.”७