भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबई येथील समाजाचे काम विविध प्रकारे जोरदारपणे चालविले त्याचप्रमाणे मुंबईबाहेरील अनेक स्थानिक प्रार्थनासमाजाच्या कामाला चालना देण्याचा प्रयत्न केला. परंतु एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांचे लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापक तत्त्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमी लागून राहिलेले असे. ह्या कार्याचा मुख्य भाग एकेश्वरी धर्मपरिषद हा होता.

१८८५ मध्ये हिंदू राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. त्यात न्या. रानडे ह्यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता. त्यांच्या डोळ्यांसमोर समग्रपणे भारताची भवितव्यता होती. राष्ट्रसभेद्वारा सामाजिक सुधारणेचे कार्य त्यांनी सामाजिक परिषदेच्या द्वारे करविले. अलाहाबादच्या चौथ्या अधिवेशनापासून राष्ट्रीय कार्याला उदार धर्माचा पाठिंबा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अलाहाबाद येथील राष्ट्रसभेच्या १८८८च्या अधिवेशनाच्या वेळेपासून उदार धर्मपरिषदेचे अधिवेशन भरविण्याचे त्यांनी निश्चित केले होते. न्या. रानडे हे ह्या धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते व पंडित शिवनाथ शास्त्री ह्यांना सेक्रेटरी म्हणून नेमले.

ब्राह्मसंघ : खरे तर ह्या प्रकारच्या कामाला १८८९ पासून प्रारंभ झाला होता. मुंबईला थीइस्ट्स युनियन (ब्राह्मसंघ) ह्या नावाची एक मध्यवर्ती संस्था स्थापन झाली. ब्राह्म समाजाच्या निरनिराळ्या पक्षाच्या एकत्र उपासना व संमेलने व्हावीत, प्रचारासाठी एकत्र प्रयत्न व्हावा, वगैरे गोष्टी ठरविण्यात आल्या होत्या. नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे सेक्रेटरी नेमले. कलकत्त्यास आदि ब्राह्मसमाज, नविधान व साधारण ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या कामात फूट पडली होती. ह्या नवीन संघामुळे ही फूट भरून निघण्याचा संभव होता. न्या. रानडे ह्यांनीच ह्या कामी पुढाकार घेतला होता. १८९५ मध्ये पुण्याच्या काँग्रेसच्या वेळी पुणे प्रार्थनामंदिरात ही बैठक झाली. त्या वेळी अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिद्ध प्रचारक रेव्ह. जे. टी. संडरलँड हे उपस्थित होते. १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचे काम मंदावले होते. १९०३च्या नाताळात ह्या परिषदेची स्थिती विस्कळीत झाली आहे हे शिंदे ह्यांच्या मनात विशेषत्वाने भरले व पुढील साली म्हणजे मुंबईला झालेल्या राष्ट्रीय सभेच्या वेळी ही धर्मपरिषद चांगल्या प्रकारे संघटित करून बोलावण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे एक-दोन अधिवेशने सोडू कराचीत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत सेक्रेटरी म्हणून ह्या सर्व कामाचा भार शिंदे ह्यांनी स्वेच्छेने पत्करला व तळमळीने पार पाडला. धर्मपरिषदेच्या कामाची कल्पना पुढे दिलेल्या तक्त्यावरून येऊ शकते.

तक्ता (तक्ता वाचण्यासाठी इथे क्लीक करावे )

१९०३ सालच्या अखेरीस मद्रास, बंगालच्या सफरीमुळे शिंदे ह्यांना हिंदुस्थानातील ब्राह्मसमाजाची बरीच माहिती प्रत्यक्ष स्वरूपात झाली होती. १९०४ साली मुंबई येथील एकेश्वरी धर्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर होते, तर सेक्रेटरी शिंदे. मुंबईच्या ह्या धर्मपरिषदेत निरनिराळ्या प्रांतांतील प्रमुख पुढा-यांचा शिंदे ह्यांच्याशी परिचय झाला. कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थनासमाजाचे महत्त्व असल्याने धर्मपरिषदेच्या कामात मुंबईच्या प्रचारकाने पुढाकार घेणे हे योग्यच होते. मुंबई येथील १९०४च्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळी होणा-या सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे भूषविणार होते. तेव्हा ह्याच वेळी भरणा-या धर्मपरिषदेमध्ये श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांना सहभागी करून घेण्यासाठी निमंत्रित करावे ही कल्पना शिंदे ह्यांना सुचली. धर्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर हे होते व स्वागताध्यक्ष सर नारायण चंदावरकर हे होते. त्यामुळे धर्मपरिषदेचे काम उत्तम प्रकारे झाले.

प्रार्थनासमाजाच्या निमंत्रणानुसार सयाजीराव गायकवाड हे एकत्रित भोजनासाठीही उपस्थित राहिले. आर्यसमाजाच्या मंडळीने भोजनाला येण्याचे कबूल केले होते. परंतु काही मुसलमान गृहस्थांना प्रार्थनासमाजाची दीक्षा दिलेली आहे हे कळल्याबरोबर त्यांनी भोजनाला उपस्थित राहण्याचा बेत रहित केला व प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मंडळी माघार कशी घेतात ह्याचा नमुना दाखविला. आर्यसमाजी मंडळीमध्ये गुजराथी लोकांचाच मोठ्या प्रमाणात भरणि होता. श्रीमंत सयाजीरावांनी मात्र ह्या भोजनास उपस्थित राहून उच्च धर्मनिष्ठ वर्तनाचा एक आदर्श दाखवून दिला. पुढील वर्षाची परिषद वाराणसी येथे काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भरणार होती. अशा परिषदांच्या जनरल सेक्रेटरीचे काम विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनीच पाहावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

पुढच्या वर्षीची म्हणजे १९०५ सालची धर्मपरिषद पंडित शिवनाथशास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली वाराणासी येथे भरली. सेक्रेटरी शिंदेच होते. काशी येथे स्थानिक ब्राह्मसमाज नव्हता व गाव जुन्या मताचा आणि क्षेत्राचा. त्यामुळे शिंदे ह्यांना स्वागतमंडळ स्थापन करणे जड गेले. मात्र ह्या परिषदेचे महत्त्व प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांना कळले असल्याने शिंदे ह्यांनी काढलेल्या परिपत्रकाला उत्तेजनपर उत्तरे आली व वर्गणीच्या रकमाही आल्या. पंडित शिवनाथशास्त्री हे वाराणसी येथील परिषदेचे अध्यक्ष होते व त्यांनी अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे काम चालविले. परिषदेचे काम एखाद्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवाप्रमाणे २४ डिसेंबरपासून ३१ तारखेपर्यंत मोठ्या सोहळ्याने पार पडले. उपासना, भजने व्याख्याने, नामसंकीर्तने व शेवटी प्रीतिभोजन इत्यादी कार्यक्रम निर्वेधपणे पार पडले. निरनिराळ्या प्रांतांतून सुमारे ७५ ठिकाणांहून ब्राह्मसमाजाचे प्रतिनिधी आले होते. ह्या ब्राह्मधर्माच्या परिषदेसाठी लंडन ख्रिश्चन मिशनच्या प्रशस्त हायस्कुलाशिवाय काशी ह्या क्षेत्रस्थानी दुसरीकडे कोठेही जागा मिळाली नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. दोन-तीन वर्षांच्या अनुभवामुळे हिंदुस्थान ह्या खंडप्राय देशातील ब्राह्मसमाजाची सर्व प्रकारची माहिती मिळवून त्यांची एक सूची (डिरेक्टरी) तयार करण्याची आवश्यकता शिंदे ह्यांना भासू लागली होती. त्यांच्यासारख्या समाजकार्यासाठी भ्रमंती करणा-या माणसाच्या लक्षात ही उणीव विशेषत्वाने आली. वाराणसी येथील परिषदेने ब्राह्मधर्मसूचिग्रंथ शिंदे ह्यांनी तयार करून प्रसिद्ध करावा असा ठराव एकमताने मंजूर केला.

तारीख ३० हा परिषदेचा मुख्य दिवस होता. बाबू प्रथमलाल सेन ह्यांनी प्रातःकाळची उपासना उत्तम प्रकारे चालविली. “खरी प्रार्थना म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही देवावर प्रीती करतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्यजातीवर प्रेम करणे, हीच ईश्वराची खरी भक्ती आणि उपासना. ईश्वराविषयी हे प्रेम मनात पूर्ण बाणले म्हणजे आत्म्याचा पालट होतो आणि जणू काय आम्ही पुनर्जन्म पावतो,” असे त्यांनी प्रतिपादन केले.१

परिषदेसाठी अनेक मान्यवर प्रतिष्ठित मंडळी आली होती. न्या. चंदावरकर, बाबू सत्येंद्रनाथ टागोर, मि. नटराजन, प्रो. रुचिराम सहानी, बाबू हेमचंद्र सरकार इत्यादी मंडळी त्यामध्ये होती. शिंदे ह्यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सांगितले, गेल्या वर्षी परिषद भरली तेव्हा फक्त ६० समाजाची नावे ठाऊक होती. आज १५० समाजांचा पत्ता लागला आहे. गेल्या वर्षी जो पत्रव्यवहार होता तेव्हा १०० पत्रे लिहावयास लागली. यंदा सुमारे ५०० पत्रे लिहिली गेली. ४७ समाजांकडून खर्चासाठी ३४३ रुपये मिळाले आहेत. सुमारे १०० प्रतिनिधींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. शिंदे ह्यांच्या प्रास्ताविकावरून धर्मपरिषद आयोजित करण्यापाठीमागे असणारा त्यांचा हेतू, प्रचाराची तळमळ व त्यांचा कामाचा उरक ह्यांची कल्पना येऊ शकते.

अध्यक्ष पंडित शिवनाथशास्त्री ह्यांचे परिषदेत मोठे उद्बोधक भाषण झाले. धर्म अबाधित राहण्यासाठी मनुष्यास स्वातंत्र्य, सयुक्तिकता, सार्वत्रिकता आणि आध्यात्मिकता अथवा सात्विकभाव ह्या चार गोष्टींची आवश्यकता असते असे त्यांनी सांगितले. ब्राह्मधर्म आणि भक्तिपंथ हे एकच आहेत. फरक कायतो मूर्तिपूजा व जातिबंधन ह्या दोन गोष्टींत आहे. प्रचारातील धर्माचा विचार केला असता त्याला ‘आध्यात्मिक धर्म’ हे नाव देण्यापेक्षा ‘सामाजिक धर्म’ हे नाव शोभते. ह्या प्रकारचे प्रतिपादन केल्यानंतर त्यांनी ब्राह्मधर्माला सनातनी मंडळी विरोध का करतात, ह्यासंबंधी वस्तुनिष्ठ विवेचन केले.

सबजेक्ट कमिटीच्या बैठकीमध्ये विविध ठरावासंबंधी निर्णय झाला. त्यमध्ये एका ठरावामुळे परिषदेच्या कमिटीमध्ये शिंदे ह्यांचा समावेश करण्यात आला व दुस-या एका ठरावामुळे हिंदुस्थानातील सर्व समाजांच्या संक्षिप्त माहितीचे एक पुस्तक (डिरेक्टरी) तयार करून प्रसिद्ध करण्याचे काम शिंदे ह्यांनी आपल्याकडे घ्यावे अशी परिषदेने विनंती केली.

ब्राह्मधर्माचा प्रसार वाढविण्याच्या आवश्यकतेसंबंधी न्या. चंदावरकर ह्यांचे प्रभावी भाषण झाले. ब्राह्मधर्माचा प्रसार स्त्रियांमध्ये होणे आवश्यक आहे ह्या सूचनेसंबंधी सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्यांनी फार कळकळीने भाषण केले. दुस-या एका गृहस्थाने शिंदे ह्यांना एका विद्यार्थ्याचे पत्र आले आहे व त्यांनी विद्यार्थ्यांसाठी धर्मविषयक वृत्तपत्र चालवावे असे सुचविले असल्याचा उल्लेख केला.२

एकंदरीत वाराणसी येथील धर्मपरिषदेचे हे अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. हे अधिवेशन आयोजित करण्यात शिंदे ह्यांनी फार कष्ट घेतले हे जसे दिसून येते त्याचप्रमाणे त्यांची दूरदृष्टी व संघटनाकौशल्य ह्यांचाही प्रभाव ह्या अधिवेशनात पडल्याचे स्पष्टपणे जाणवते.
 
वाराणसी येथील परिषदेत बंगालमधील तीनही ब्राह्मसमाजाची परस्पर सहानुभूती बरीच वाढली. निरनिराळ्या प्रांतातील ब्राह्मांचा स्नेह झाला. ह्या परिषदेचा हितकारक व उत्साहवर्धक वृत्तान्त अन्यत्र सांगावा; मुंबई प्रार्थनासमाजाची माहिती दूरदूरच्या समाजास कळावी; काही प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करवून घ्यावी; मुख्य मुख्य स्थानिक समाज पाहावे असा हेतू धरून शिंदे ह्यांनी बंगाल, बिहार, आसाम ह्या प्रांतातून एक मोठा विस्तृत दौरा काढला. ब्राह्मसमाजाची अखिल भारतीय पातळीवर संघटना होण्याच्या दृष्टीने व त्यांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने असा दौरा काढणे शिंदे ह्यांना आवश्यक वाटले.

प्रथमतः बिहार प्रांताची राजधानी बांकीपूर येथे ते २ जानेवारी १९०६ रोजी गेले. मुख्य ब्राह्मसमाज नवविधान मताचा होता व भाई प्रकाशचंद्र राय हे त्यांचे पुढारी होते. साधारण ब्राह्मसमाजाची तेथे एक राममोहन रॉय सेमिनरी नावाची शाळा होती व साधारण ब्राह्मसमाजाची उपासना तेथेच होत असे. तारीख ४ रोजी शिंदे ह्यांनी प्रमुख मंडळी जमवून मुंबईकडची हकिकत सांगितली. उत्सवात ब्राह्मसमाजाच्या दोन्ही पक्षांनी मिळून कार्यक्रम ठरवावा, एकमेकांच्या उपासनेस पाळीपाळीने जावे असे ठरले. ह्या दोन पक्षांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावे असा शिंदे ह्यांचा हेतू होता. बॅ. दास ह्यांच्या घरी ता. ५ रोजी दोन्ही पक्षांच्या स्त्रियांची सभा भरली. पोस्टल मिशन, डोमेस्टिक मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामे स्त्रियांनी कशी करावयाची हे शिंदे ह्यांनी सांगितले. काशी परिषदेस आलेल्या सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्या सिल्हेटहून मुद्दाम आल्या होत्या. त्यांनी हिंदीमधून भाषण केले. ब्राह्मधर्माच्या प्रचारकार्यात स्त्रियांना सहभागी करून घ्यावे असा शिंदे ह्यांचा विचार व प्रयत्न नेहमीच होता.

बांकीपूरनंतर शिंदे यांनी मोंघीरला एक दिवसाची भेट दिली व दुस-या दिवशी जानेवारी ७ला शिंदे भागलपूरला गेले. तेथील समाजात बडी बडी प्रमुख व वृद्ध मंडळी थोड्या प्रमाणात होती. सुमारे ५-६ तरुण पदवीधर ब्राह्ममंडळींपुढे मुंबईच्या तरुण ब्राह्ममंडळाचे छापील नियम शिंदे ह्यांनी वाचून दाखविले व तेथील पूर्वीच्या तरुणांची संस्था पुन्हा स्थापन करावी असे आवाहन केले.

काठीहर येथे समाजमंदिराचे बांधकाम अर्धवट स्थितीत असलेले शिंदे ह्यांनी पाहिले. तेथे समाज मात्र अस्तित्वात नव्हता. पूर्णिया येथे आल्यावर तेथील वजनदार मंडळींच्या सहकार्याने काठीहारमधील इमारत पूर्ण व्हावी व तेथे समाज चालू व्हावा असा प्रयत्न शिंदे ह्यांनी केला. पूर्णिया भेटीनंतरची कुचबिहारची भेट समाजकार्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती.

भूतान संस्थानच्या हद्दीस लागून कुचबिहार हे संस्थान आहे. तेथील मूळचे रहिवासी कुचकोल नावाचे जंगली लोक आहेत. तेथील राजघराणे ह्याच जंगली जातीचे आहे. फक्त अधिकारीवर्ग मात्र बंगाली लोकांचा होता. येथे एम. ए. पर्यंत पूर्ण दर्जाचे एक कॉलेज होते. “सुधारणेची ही थोडी चिन्हे सोडून दिल्यास कुचबिहार नगरावर व तेथील अस्सल प्रजेवर अद्यापि हिमालयाचेच पुरातन वन्य साम्राज्य चालू आहे. राजमहाल, चार बड्या लोकांची घरे आणि काही सरकारी इमारती सोडून दिल्यास बाकी सर्व लहानमोठ्यांची घरे अक्षरशः झोपड्याच! गावाकडे नजर फेकल्यास असे वाटते की, केळी व पोफळी ह्यांच्या सुंदर बनात एकांत जागा पाहून आधुनिक सुधारणेच्या प्लेगला कंटाळून जणू एक सेग्रिगेशन कँपच बांधला आहे, “असे कुचबिहारचे वर्णन शिंदे ह्यांनी केले आहे.३

बंगालमधील ब्राह्मसमाजात दुफळी निर्माण होण्यास हा कोप-यातील कुचबिहार कारणीभूत झाला होता. १८७८ मध्ये केशवचंद्र ह्यांच्या थोरल्या मुलीचा विवाह कुचबिहारचे राजे नृपेंद्रनारायण यांच्याशी झाला. त्या वेळी केशवचंद्रांच्या कन्येचे वय १४ वर्षांहून कमी होते. म्हणून केशवचंद्रांच्या नवविधान समाजात दुफळी पडून नवा साधारण ब्राह्मसमाज निर्माण झाला. शिंदे तेथे गेले त्या वेळी नवविधान समाजाची ११ आनुष्ठानिक कुटुंबे होती. त्यात एकंदर ७० मुले-माणसे होती. शिवाय ४० हितचिंतक होते. स्वतः राजे समाजाचे अध्यक्ष होते. मात्र सर्व व्यवस्था राणीसाहेब म्हणजेच केशवचंद्र सेन यांची कन्या पाहत होती.

“इतके सुंदर ब्राह्ममंदिर निदान माझ्यातरी पाहाण्यात कुठे आले नाही”, असे शिंदे ह्यांनी कुचबिहार येथील ब्राह्ममंदिराबद्दल म्हटले आहे. रविवारी त्यांची तेथे उपासना झाली व तारीख १३ रोजी टाऊन हॉलमध्ये ‘रिलिजन अँड दि बेसिस ऑफ लाईफ’ (धर्म हा जीवनाचा पाया) ह्या विषयावर इंग्रजीमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. शिंदे कुचबिहार येथे असताना कॉलेजकुमारांनी जी जिज्ञासा, तत्परता व उत्सुकता दाखविली, ती शिंदे ह्यांना उत्साहवर्धक वाटली. ती पाहून शिंदे ह्यांच्या मनात असा विचार आला की, कुचबिहार येथे एखाद्या ताज्या दमाचा प्रचारक पाठविला तर पुष्कळ काम होण्याजोगे आहे. पण लगेच समाजांतर्गत असलेल्या राजकारणामुळे ते शक्य होणार नाही ह्याचीही खात्री पटली. तेथील कार्यक्रम आटोपून १५ जानेवारीस ब्रह्मपुत्रेच्या काठी असलेल्या डुब्री ह्या गावी ते दाखल झाले.

आसाम प्रांतातील डुब्री ह्या ब्रह्मपुत्रा नदीने कवटाळलेल्या गावी नदीच्या तीरावर शिंदे उभे होते. सोबत बाबू उपेंद्रनाथ बोस हे ब्राह्मसमाजाचे वजनदार पुरस्कर्ते उपस्थित होते. सनातन ब्राह्मसमाजाचा शुभमहिमा शिंदे यांच्या मनाला जाणवत होता. भोवतालच्या शांत गंभीर देखाव्याचे व साक्षात ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन त्यांना घडले. त्याक्षणी त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, “ब्राह्मधर्माचा प्रचारक होण्यात मला जी धन्यता व सुख वाटत आहे त्यापुढे राजसुखही तुच्छ होय.” हा विराट गंभीर देखावा बघितल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे हे चिंतनामध्ये काही क्षण मग्न झाले.

येथील समाजामध्ये मंडळींची एकजूट व एकमेकांविषयी कळकळ दिसून आली. ती पाहून शिंदे ह्यांना फार आनंद झाला. विशेषकरून स्त्रियांमध्ये उपासनेविषयी विशेष उत्कंठा दिसून आली. त्यांच्यासाठी शिंदे ह्यांनी हिंदीमध्ये उपासना केली. दुस-या दिवशी सायंकाळी समाजामध्ये ‘आधुनिक भारतासाठी काही आदर्श’ ह्या विषयावर इंग्रजीत व्याख्यान दिले. आजूबाजूचा आल्हाददायक निसर्ग, ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन आणि ब्राह्मबंधूंमध्ये असलेला प्रेमभाव व ब्राह्मभगिनींची कळकळ ही सारी बघावयास व अनुभवास मिळाल्यामुळे शिंदे ह्यांचा डुब्री येथील मुक्काम फारच आनंददायक झाला.

डुब्रीवरून निघून तारीख १८ रोजी शिंदे मैमनसिंग ह्या गावी आले. नवविधानसमाज व साधारणसमाज अशा दोन्ही समाजातील माणसे तेथे होती. मैमनसिंगचा विशेष असा की, साधारणसमाजाचे आचार्य श्रीनाथ चंदा ह्यांनी गावाबाहेर बरीच जागा घेऊन तेथे ब्राह्म लोकांचे एक खेडे वसविले होते.

पूर्व बंगालची राजधानी असलेल्या डाक्का येथील समाज कलत्त्याच्या खालोखाल महत्त्वाचा गणला जात होता. आतापर्यंतच्या प्रवासाचा परिणाम शिंदे यांना डाक्का येथे विशेषत्वाने जाणवला. बंगालमधील गोड अन्न व मोहरीच्या तेलाचा वापर यांचा वीट आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. मँचेस्टर कॉलेजमधून उच्च धर्मशिक्षण घेऊन आलेल्या धर्मप्रचारक तरुणाचे व्याख्यान आहे असे समजल्याने शिंदे ह्यांच्या व्याख्यानाला तेथील समाजात अलोट गर्दी जमली होती. शिंदे ह्यांनी इंग्रजीत दहा-पंधरा मिनिटे भाषण केल्यावर त्यांना भोवळ आली व ते खुर्चीत गळून पडले. सभेचा मोठा विरस झाला. दोन दिवस विश्रांती घेऊन ब्रह्मपुत्रा नदीवरील बोटीने ते बारीसाल येथे पोहोचले. ह्या जलप्रवासाने प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. बारीसालमध्ये त्यांचे व्याख्यानही परिणामकारक झाले. व्याख्यान आटोपून शिंदे व्यासपीठावरून खाली उतरल्याबरोबर त्यांच्या हातात पूर्वी उल्लेखिलेली तातडीची तार देण्यात आली. मुंबई येथे त्यांची पत्नी फार आजारी आहे व अहमदनगरास बहीण चंद्राक्का अत्यवस्थ आहे असा तारेतील मजकूर होता. त्यामुळे पुढचा दौरा तसाच टाकून शिंदे यांना मुंबईस परत यावे लागले. मात्र ह्या दौ-याने बंगाल, बिहार, आसाम, या प्रांतांमध्ये ब्राह्मसमाजाची स्थिती कशी आहे; स्थानिक स्वरूपाचे कोणते प्रश्न तेथे आहेत; ब्राह्मसमाजाची पुनर्घटना करण्याची शक्यता कितपत आहे वगैरेबद्दलची प्रत्यक्ष माहिती त्यांना मिळाली व समाजातील अनेक वजनदार पुढा-यांचा प्रत्यक्ष परिचय झाला. अखिल भारतीय पातळीवर धर्मपरिषदेचे काम करण्याच्या दृष्टीने हा त्यांचा लाभच होता.