प्रकरण पाचवे : उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्य

येथपर्यंत मध्ययुगीन अस्पृश्यतेचें विवेचन झालें. आता तिसरा टप्पा जो उत्तरयुगीन म्हणजे ज्या काळीं बौद्ध धर्माचा नायनाट जैन, शैव, वैष्णवादिकांनी अनुक्रमाने चालविला आणि त्यानंतर मुसलमानांची धाड येऊन तो (बौद्ध धर्म) नाहीसा झाला, तो काळ होय. ह्या काळांतील अस्पृश्यतेचें एक मुख्य लक्षण म्हणजे तत्कालीन अस्पृश्यांच्या संख्येमध्ये निरनिराळ्या प्रांतांतून आंधळें राजकारण आणि जुलमी राज्यक्रांति ह्यामुळें भली मोठी ठोकळ भर पडली, हें होय. तरी तिकडे आपण आता वळूं. इ.स. १८९४ सालीं मद्रास येथे थिऑसॉफिकल सोसायटीने तेथील पारियांची स्थिती सुधारण्यासाठी प्राथमिक शिक्षणाच्या शाळा सुरु केल्या. ह्या प्रयत्नास प्रोत्साहन देण्यासाठी ह्या सोसायटीने तत्कालीन उदारधी अध्यक्ष कर्नल ऑल्कॉट यांनी सन १९०१ साली The Poor Pariah ('बिचारा पारिया') ह्या नांवाची एक इंग्रजी चोपडी प्रसिद्ध केली. तिच्या २४ व्या पानापासून शेवटपर्यंत एक नवीन कल्पनेचा निर्देश आणि पुरस्कार केला आहे. ती कल्पना म्हणजे हल्लीचे पारिया हे एके काळी बौद्ध होते, आणि पुढील धर्मक्रांतीच्या काळी ते हिंदुधर्मांत सामील न झाल्यामुळे राजशासनावरुन त्यांना अस्पृश्य ठरवण्यांत आलें, ही होय. १८९८ च्या सुमारास कर्नल ऑल्कॉटकडे पारिया जातीचे कांही पुढारी आले आणि म्हणू लागले की अशोकाचे वेळी आपण बौद्ध होतों, म्हणून आमच्यासाठी ऑल्कॉट साहेबांनी बौद्धांचा एक नवीन संघ काढून त्यांत आम्हांस घ्यावे. ऑल्कॉट साहेबांनी त्यांना कोलंबो येथील H. Sumongala (एच्. सुमंगल) ह्या मुख्य बौद्ध भिक्षूकडे नेलें. त्यांनी एक मोठ्या जाहीर सभेंत त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. परंतु हे लोक पूर्वी बौद्ध होते ह्याविषयींची पुरावा ऑल्कॉट साहेबाला मिळाला नाही. अश्वघोषाचा कांही लेख आपणाजवळ होता असें पारियांचे म्हणणें होतें. पण तो लेख त्यांना त्यांचेकडून मिळाला नाही. तथापि असा पुरावा पुढे मागे मिळेल अशा ऑल्कॉट साहेबांनी खात्री होती. कोलंबो येथील एक तामिळ हिंदु मि. व्ही. जी. टी. पिल्ले यांनी सिद्धांतदीपिका नांवाच्या एक मासिकांत लिहिलेल्या लेखांतून पान २५ वर खालील उतारा दिला आहे :-

 

" इ.स. ५३४ च्या सुमारास सिलोनच्या एका बौद्ध राजाने पुष्कळ तामिळ शैव ग्रंथाचा नाश केला, त्यावरुन शैवाचा बौद्ध किती तिटकारा करितात हें कळणें कठीण नाही. उलटपक्षी जेव्हा तामिळ हिंदूंनी सिंहलद्धीपावर स्वारी केली तेव्हा त्यांनी तालवृक्षाइतके उंच बौद्धधर्माचे ग्रंथ जाळिले आणि बौद्धांचा नायनाट केला. मधुरेचा बौद्ध राजा कण्ह पांड्य याने इ. स. च्या सहाव्या शतकांत शैव धर्म स्वीकारिल्यापासून बौद्धांच्या -हासास सुरुवात झाली." तामिळ भाषेंतील सर्वात मोठे आणि सन्मान्य काव्य 'कुरळ' हें होय. ह्याचा कर्ता तिरुवल्लुवर हा पारिया होता. ( वाल्मीक ऋषिच म्हणावयाचा!) इ. स. १८८५ च्या मॅन्युअल ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पान ३३-३६ वर म्हटलें आहे की तामिळ पारिया हे दुस-या कोणत्याही जातीपेक्षा शारिरिक गुणाने श्रेष्ठ ठरतात. सर्व दक्षिण देशांत यांचें महत्त्व अधिक आहे. पारिया हे वायव्य दिशेने आर्यांच्या पूर्वी दक्षिण हिंदुस्थानांत येऊन तेथील राज्यकर्तें झाले असावेत असें ह्या मॅन्युअलमध्ये म्हटलें आहे. ऑलकॉट यांच्या चोपडींत पान २९ वर 'हालस्य महात्म्यं' नावाच्या ग्रंथांत ६९ व्या भागामध्ये ८००० द्रविडियनांना ज्ञानपूर्ण ह्या नांवाच्या एक संन्याशने शैव धर्मांत कसें घेतले ह्याचा उल्लेख केला आहे. ह्यापैकी जे शैव धर्मांत येण्यास नाखूष होते त्यांचे हालहाल करुन सिरश्छेद केले. तेलाच्या घाण्यांत त्यांची डोंकी घालून रगडली आणि त्यांची शरीरें सुळावर लोंबत ठेवून कोल्ह्याकुत्र्याकडून फाडविली ह्यांचे एक दृश्य चित्र मदुरा येथील मीनाक्षीच्या भव्य देवालयाच्या भिंतीवर कोरलेलें आहे. ऑल्कॉट साहेबांनी आपल्या चोपडीच्या शेवटच्या पानावर ह्या चित्राचा ब्लॉक दिला आहे.


ह्याप्रमाणे कर्नल ऑल्कॉट यांनी आपल्या वरील कल्पनांना अनुकूल व प्रतिकूल असलेली व आपणास सहज उपलब्ध झालेली माहिती प्राजलपणें जशीच्या तशी दिली आहे. पण ती माहिती अर्थातच अपुरी आहे. ह्याच मुद्यावर दुस-या अनपेक्षित दिशेने सुदैवाने बळकट पुरावा सांपडत आहे, तो खाली दिला आहे :-


आंध्रदेशांतील विजयनगर येथील कॉलेजातील दोन तरुन प्रोफेसर एम्. एस्. रामस्वामी आयंगार आणि व्ही शेषगिरिराव यांनी मिळून ब-याच श्रमाने प्राचीन तामिळ वाड्मयाचें अवगाहन करुन Studies in South Indian Jainism ( 'दक्षिणेंतील जैन धर्मांचे अध्ययन') ह्या नांवाचा एक विस्तृत शोधग्रंथ अलीकडे प्रसिद्ध केला आहे. आयंगार हे वैष्णव व राव हे तेलगु ब्राह्मण असून ते केवळ संशोधक असल्यामुळे पक्षपाताचा आरोप त्यांचेवर येण्याचा संभव नाही. त्यांनी दक्षिणेंत शैव आमि वैष्णव ब्राह्मणांनी बौद्धांचा आणि विशेषत: जैनांचा किती अनन्वित छळ केला हें अगदी निर्भीडपणें ठिकठिकाणी वर्णिले आहे. मदुरेच्या कण्हपांड्य राजाला तिरुज्ञानसंबंदर या शैव संन्याशाने आणि कांचीच्या महेंद्रवर्मा नांवाच्या पल्लव राजाला तिरुना बुक्करसर उर्फ आप्पार नांवाच्या शैव आचार्याने जैन धर्मांतून शैवधर्मांत घेतल्याने जैन धर्मांच्या उलट जो इ. स. ७५० सालच्या सुमारास भयंकर वणवा पेटला त्यांत ८००० दिगंबर जैन साधूंना सुळावर चढवून ठार करण्यांत आलें, ही गोष्ट दंतकथा नसून ऐतिहासिक आहे अशी येथे पुष्टि देण्यांत आली आहे. कर्नल ऑल्काटच्या 'हालस्य महात्म्या'तील वरील उता-याला याप्रमाणे दुजोरा मिळत आहे. वरील दोन प्रोफेसरांनी पारियांच्या बाबींत कांहीच उल्लेख केला नाही हें खरें आहे. या बाबतींत संशोधकांनी आणखी पुष्कळ श्रम केल्यास अधिक पुरावा मिळण्याची निराशा बाळगण्याचें कारण नाही.


इ.स. १९०८ सालीं मी जेव्हा मद्रास येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक शाखा स्थापण्यासाठी गेलों तेव्हा तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजांतील तेव्हांचे भौतिकशास्त्राचे प्रोपेसर लक्ष्मीनरसु यांची गांठ घेतली. त्यांनी त्या पारिया लोकांत बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची त्यावेळी चळवळ चालविली होती. हे थिऑसॉफिस्ट नाहीत. पूर्वाश्रमीचे हिंदु नायडू असून ते आता सहकुटुंब बौद्ध झाले आहेत. त्यांनी आता पारियांचा एक बौद्ध संघ स्थापिला असून स्वत: त्या संघाचे ते अध्यक्ष आहेत. तामिळ आणि मल्याळ देशांत विशेषत: पश्चिम व पूर्व किना-यावरील 'अस्पृश्य' वर्गाची स्थिती मी स्वत: बारकाईने जसजशी अधिक निरखून पाहूं लागलों तसतसें ऑल्काटच्या ह्णण्याप्रमाणे हे लोक फार पूर्वी ह्या प्रांतांतील राज्यकर्ते असावेत व मध्ययुगांत त्यांचा धर्म बौद्ध अगर जैन असावा असे अंधुक पुरावे दिसूं लागले. मलबारांत मलयगिरीवर पुलया(पुल्कस) नांवाच्या अस्पृश्य वर्गीयांचे कांही जुने किल्ले आढळले. त्यांच्या देवांना 'चाटन' म्हणजे 'शास्ता' ह्या बौद्ध नांवाचा प्रचार कांही ठिकाणी आढळला. 'चाटन' हा शब्द शास्ता ह्या संस्कृत शब्दाचें अपभ्रष्ट रूप आहे. शास्ता=चाट; 'न' असा आदेश द्राविड भाषेंत प्रत्येक नावापुढे येतो. उदाहरणार्थ, राम=रामन्. शास्ता हें एक बुद्धाचे नांव अमरकोषांत आढळते. असो. 'चिरुमा' आणि विशेषत: 'यझवा' अथवा 'तिय्या' या अस्पृश्य जाती पूर्वापार संस्कृतचें उत्तम अध्ययन करीत असलेल्या आढळल्या. तिय्या बातीमध्ये नारायणस्वामी नावाच्या एक संन्याशाने आत्मोद्धाराची नवीन धार्मिक चळवळ मोठ्या जोरांत चालविलेली पाहिली. या आत्मोद्वाराच्या चळवळीचें मुख्य लक्षण म्हणजे हजारों रुपयांचे फंड जमवून ह्या तिय्या जातीच्या लोकांसाठी ठिकठिकाणी सुंदर व प्रशस्त देवळें बांधणें व त्यांतून संस्कृत उत्तम शिकलेले त्याच जातीचे तरुण देवपूजक तयार करणें व त्यांच्या वृत्तीची योजना करणें, हें होय. ह्या तपस्वी स्वामींची मी पुन:पुन्हा भेट घेऊन त्यांच्या चळवळीचें आध्यात्मिक स्वरुपही निरखून पाहिलें. या अस्पृश्य जातीमध्ये शेंकडो सुशिक्षित इंग्रजी पदवीधर सरकारी नोकरींत हायकोर्ट जजाच्या पायरीपर्यंत चढलेले, व्यापारांत मोठ-मोठ्या पेढ्या स्थापन केलेले, वकील, डॉक्टर इत्यादि नवीन धंदे यशस्वी रीतीने चालविलेले, नव्या कौन्सिलचे सभासद आणि लोकधुरीण असे झालेले असून त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे. तथापि त्यांनाही हिंदु देवळाच्या वाटेवर चालण्याची मुभा नाही. हा विपरीत प्रकार पाहून पाहून ऑल्कॉटच्या वरील म्हणण्याचा पुरावा मिळविण्याची निराशा मला तरी वाटत नाही.


ढोबळ मानाने इतकेंच म्हणतां येईल की ब्राह्मणी संस्कृतीची वर्णव्यवस्था बौद्ध आणि जैन धर्माची अमदानी जोरांत होती तेव्हा शिथिल झाली असली तरी नष्ट झाली नव्हती. ह्या क्रांतीच्या काळी ब्राह्मणी संस्कृतीच्या हिंदूंनी जेथे जेथे आपल्या वसाहती केल्या तेथे तेथे त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे मूळच्या तद्देशीयांचे अधिराज्यच नव्हे तर वैयक्तिक मालकी हक्कही नष्ट होऊन, ते केवळ बलुतेदार बनून ग्रामबाह्य व अस्पृश्य ठरले. महाराष्ट्रांत बलुतेदारी तरी त्यांना मिळाली पण दक्षिण देशांत तामिळ, मलबारकडे ते केवळ गुलामगिरींत गडप झाले. अशा वसाहती पुष्कळशा बौद्ध धर्मांच्या अमदानींतच आणि कांही तत्पूर्वीही झाल्या असाव्यात. शेवटी जेव्हा दक्षिणेकडील व पूर्वेकडील प्रांतांत ह्या पाखांडी म्हणून समजले जाणा-या धर्मांचा उच्छेद झाला तेव्हा त्यांतील वरच्या दर्जोच्या लोकांचा, गरजेपुरता आणि पारस्थितीप्रमाणे, नवीन हिंदुधर्मांत समावेश होऊ शकला. परंतु खालच्या तेजोहीन, मांसाहारी, हीनकर्मी व केवळ अकुशल श्रमजीवी बहुजनसमाजाची भर ठोकळ मानाने 'अस्पृश्य' आणि ग्रामबाह्य वर्गांत होणें अगदी साहजिक आहे. मागे पान ४३ वर " पाषंड चंडालानाम् स्मशानाते वास:।" असा कौटिलीय अर्थशास्त्राचा उतारा दिला आहे त्यांतील पाषंड याचा अर्थ मगध देशांत जरी बौद्ध जैन असा होणें कठीण असलें, तरी खाली दक्षिण देशांत बौद्ध-जैनांच्या नायनाटांनंतर पाषंड म्हणजे बौद्ध-जैनच असा होणे साहजिक आहे. मनुस्मृतीने ब्राह्मणप्रधान वर्णव्यवस्थेचा करडा अम्मल चालविस्यावर तेजो. हीन खालच्या वर्गाची, विशेषत: पाषंडी मतांची, अशीच अवनति होणे सहज आहे. मनुस्मृतीत स्पष्ट खालील आज्ञा राज्यकर्त्यांना फर्माविल्या आहेत.


यो लोभादधमो जात्या जीवदुस्कृष्टकर्मंभि:।
तं राजा निर्धनं कृत्वा क्षिप्रमेव प्रवासयेत् ।।
मनुस्मृति , १०. ९६


अर्थ : अधम जातीचा जो कोणी उत्कर्षांच्या लोभाने वरिष्ठ जातीची
वृत्ति चालवील त्यांचे राजाने सर्वस्व हरण करुन ताबडतोब त्याला देशोघडीला लावावें. कारण


शक्तेनापि हि शूद्रेण न कायों धनसंचय्:।।
शूद्रो हि धनमासाद्य ब्राह्मणानेव बाधते ।।
मनुस्मृति, १०. १२९


अर्थ : शूद्राला धनसंचय करण्याला परवानगी असूं नये. तो ब्राह्मणास बाधक होईल.


ह्याच भीतीने ह्या निराधार पाखंड्यांना महाराष्ट्रांतल्याप्रमाणे बलुतेदारही न बनविता केवळ पिढीजाद पशुतुल्य गुलामगिरीची सनद दक्षिण देशांत विशेषत: मलबारांत दिलेली आज आढळते. हे प्राणी एके काळी स्वत:च्याच असलेल्या शेतांत नंबुद्री ब्राह्मण आणि त्यांचे हस्तक नायर क्षत्रिय ह्यांच्या तैनातींत वंदे गुलाम बनलं आहेत. हे मनुस्मृतींचे जुलमी राजकारण !


वरील एकंदर विवेचनावरुन द्राविड आणि मलबार देशांतील हल्लीच्या प्रचंड संख्येच्या अस्पृश्यांच्या विकासांचे तीन टप्पे होतात असें मला वाटतें. (१) पान ३९-४० वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे द्राविड देशांत अस्पृश्यतेची संख्या आर्यांच्या आगमनापूर्वाही असावी. पण ही कशी व किती उग्र स्वरुपाची होती ह्याचा पुरावा आता उपलब्ध नाही. (२) उत्तरेकडे बौद्ध जैनाचा विजय होऊन आर्यांच्या वर्णव्यवस्थेला जो अडथळा झाला त्या वेळी, किंबहुना कदाचित् त्यापूर्वीही, आर्यांच्या दक्षिणेकडे ज्या थोड्या नंबुद्री ब्राह्मणांच्यासारख्या वसाहती झाल्या त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे अस्पृश्यतेचा दुसरा मजला तयार झाला. (३) नुकतेंच वर वर्णिल्याप्रमाणे हट्टी पाखाड्यांची मोठ्या प्रमाणात अस्पृश्यांत गणना करुन हल्लीचा प्रचड तिसरा मजला तयार झाला.


ह्या शेवटच्या टप्प्यासंबंधी दक्षिण हिंदुस्थानांत जरी भरपूर पुरावा अद्यापि गोळा करण्यांत आला नाही तरी तो उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानांतील संशोधकाना सुदैवाने निश्चित उपलब्ध झाला आहे. तो कसा ते पुढींल परिच्छेदांत पाहूं.


वर वर पाहतां अखिल भरतखंडांत हिंदूची वर्णव्यवस्था रूढ झालेली जरी दिसत आहे तरी तिचा तपशील आणि जोर निरनिराळ्या प्रांतात अगदी निराळा आहे. ह्या भिन्नतेचें कारण ब्राह्मणी आणि बौद्ध संस्कृतीची भिन्नाभन्न काळीं भिन्नभिन्न कारणांनी झालेली झटापट हें होय. पंजाब आणि वायव्येकडील प्रांतांत जी व्यवस्था आहे, ती बिहार, बंगाल ओरिसाकडे आढळत नाही आणि खाली द्राविड देशांत अगदीच निराळी आहे. बिहार, बंगाल देशांत बौद्ध धर्माचा उदय आणि अंमल जारी असल्याने आणि हिंदुस्थानांत याच भागांत बौद्ध धर्म उद्य पावन तो येथेच सर्वांत अधिक काळ टिकल्याने येथील जातिभेदाची रचना इतर प्रांताहून अगदी निराळी दिसते. येथे ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन उच्च वर्णांची जी तुरळक वस्ती आहे ती बाहेरूनच आलेली आहे. वैद्य, कायत्थ हा जो मोठा मध्यम वर्ग आहे तो क्षत्रिय आणि वैश्य यांचे मिश्रण आहे. आणि बाकी उरलेला जो मोठा बहुजनसमाज ते निर्भेळ आर्येंतर आणि एकेकाळीं पूर्ण बुद्धानुयायी होता. बाराव्या शतकांत मुसलमानांची अकस्मात् धाड येऊन जी राज्यक्रांति झाली तिचा धक्का जीर्ण झालेल्या बौद्धधर्माला लागून, तो नष्ट झाला. मुसलमानी हल्ल्याची ही लाट ओसरून गेल्यावर बौद्धांच्या ठिकाणी ब्राह्मणांनी तत्कालीन क्षत्रिय राजांच्या साह्याने समाजाची हल्ली रुढ असलेली पुनर्घटना केली. ह्या घडामोडींत बल्लाळसेन हा राजा प्रमुख होता. त्याने नवीनच स्मृति बनवून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने आचरणीय, अनाचरणीय, अस्पृश्य आणि ग्रामबाह्य वगैरे जनसमूहाचे नवीन वर्ग बनविले. अर्थात् ह्या उलाढालींत नवीनच एका मोठ्या अस्पृश्य वर्गाची समाजात भर पडली. ही गोष्ट आधुनिक संशोधनामुळे कशी सिद्ध होत आहे ते पांहू.


संशोधनाचे कार्मी बंगाली पंडितांनी अलीकडे बरीच आघाडी मारली आहे. हिंदुस्थानांतून बौद्ध धर्म अजीबाद नष्ट झाला आहे अशी असून पुष्कळांची समजूत आहे. पण खरा प्रकार तसा नसून बंगाल्यातील कांही भागांतून आणि विशेषत: ओरिसांतील कांही कानाकोप-यात हा धर्म काही अप्रसिद्ध आणि मागासलेल्या जातींत अद्यापि प्रचलित आहे. व त्याची गणना चुकून हिंदुधर्मांतच होते, असा शोध प्रसिद्ध संशोधक महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री ह्यांनी केला आहे. ओरिसांत मयूरभंज म्हणून एक लहानसें संस्थान आहे. तेथील महाराजांच्या साह्याने बाबू नगेंद्रनाथ वसू, बंगाली विश्वकोशाचे संपादक, ह्यांनी १९०८ साली त्या संस्थानच्या जंगलांत प्रवास केला, तेव्हा त्यांना जे शोध लागले ते त्यांनी इ. स. १९११ साली Modern Buddhism and its followers in Orissa ( 'आधुनिक बौद्धधर्म आणि त्याचे ओरिसांतील अनुयायी') ह्या नांवाच्या पुस्तकाच्या रुपाने प्रसिद्ध केले आहेत. त्या पुस्तकाला सदर हरप्रसाद शास्त्री यांनी आपली विस्तृत आणि अधिकारयुक्त प्रस्तावना जोडिली आहे. पान २४ वर शास्त्री महाशय लिहितात :

 

" इ.स.च्या १२ वे शतकाचे शेवटी मुसलमानांची टोळधाड हिंदुस्थानावर पडली. त्यांनी प्रमुख बौद्ध मठांचा आणि विश्वविद्यालयांचा नाश करुन त्या ठिकाणी आपल्या लष्कराचें ठाणें केलें. हजारों साधूंचा शिरश्छेद करुन त्यांची संपत्ति लुटली, पुस्तकांलयें जाळलीं,... ब्राह्मणांनी ह्या संधीचा फायदा घेऊन बौद्धधर्म हिंदुस्थानांतून समूळ नाहीसा झाला असें भासविण्यास सुरुवात केली. सुशिक्षित आणि बुद्धिवान बौद्ध मारले गेले, अथवा दूरदेशी पळून गेले. मागे त्यांचा प्रांत ब्राह्मणांच्या कारवाईला मोकळा झाला. पुष्कळ बौद्धांना जबरीने किंवा फुसलाऊन मुसलमानी धर्मांत कोंबण्यांत आलें. अशिक्षित बौद्ध बहुजनसमाज कोकरांच्या कळयाप्रमाणे निराश्रित झाला. त्याला मुसलमानी किंवा हिंदु धर्माचा नाइलाजाने आश्रय घ्यावा लागला. अशा निराश्रितापैकी जे पूर्णपणे आपल्या कह्यांत येण्यास कबूल होते. त्यानाच दुराग्रही ब्राह्मणांनी हिंदु धर्मांत घेतले. अशांना नवशाखा शूद्र अशी बंगाली समाजांत संज्ञा आहे. ह्याशिवाय इतर जो बौद्धांचा मोठा भाग स्वतंत्रपणे राहूं लागला, तो बहिष्कृत होऊन अनाचरणीय उर्फ अस्पृश्य ठरला."


ह्या अनाचरणीय जाती हल्ली जरी अस्पृश्य हिंदु समजण्यांत येत आहेत तरी त्या पूर्वी चांगल्या सन्माननीय बौद्ध होत्या. त्यापैकी हल्ली सर्वच अस्पृश्य नाहीत. नुसत्या अनाचरणीय म्हणजे ज्यांचे पाणी ब्राह्मणास चालत नाहीत अशा होत. वणिक् सोनाराची जात अतिशय श्रीमंत व वजनदार असूनही ती अशीच अनाचरणीय आहे. त्यांची गणना नवशाका शूद्रापेक्षाही अधिक खालची गणली जात आहे. ते पूर्वी चांगले बौद्ध होते. पण त्यांच्यावर ह्या धांदलीच्या काळांत बल्लाळसेन ह्या हिंदु राजाचा कांही इनामी कारस्थानामुले राग होऊन ते असे खाली दडपले गेले. मग इतर सामान्य पण स्वातंत्र्येच्छु जाती अगदी हीन व अस्पृश्य बनल्या ह्यांत काय नवल ! मुसलमानांची पहिली धडाडी संपून त्यांचा जम बसल्यावर आणि बौद्धधर्म दडपून गेल्यावर बंगाल्यांत हिंदु धर्मांची नवी घडी पुन: बसू लागली. ह्या संबंधी ह्या शास्त्रीपंडितांचे असें मत आहे की लोकांना आपल्या पूर्वापार ख-या संबंधांचा विसर पडला. आणि ब्राह्मण सांगतील त्याप्रमाणे हल्लीचे जातिभेद संकरजन्य अगर बहिष्कारजन्य आहेत असा समज दृढ झाला. ह्या नवीन रचनेच्या शिरोभागी ब्राह्मण विराजमान झाले. इतकेंच नव्हे तर उलटपक्षीं कित्येक कुशल कारागीर जाती आणि संपन्न व्यापारी वर्ग देखील ते पूर्वी सन्मान्य बौद्ध होते ते या मनूंत हीनत्वाप्रत पोचले. ज्यांच्या पूर्वजांनी कांही शतकापूर्वी बुद्धधर्मांची तत्त्वे तिबेट आणि चीन देशांत पसरलीं, ज्यांनी जलप्रवास करुन हिंदुस्थानचा उद्योग आणि व्यापार वाढविला अशी 'मनसार भाषान्' इत्यादि आद्य बंगाली ग्रंथांतून भडक वर्णनें आहेत, तेच आज केवळ ब्राह्मणांच्या कटाक्षामुळें अनाचरणीय व तिरस्करणीय बनले आहेत ! ( Modern Buddhism प्रस्तावना पान २३ पहा.)


पण अशा विपन्नावस्थेमध्येंही बौद्ध धर्म अगदीच नष्ट झाला नसून तो गुप्तरुपाने हीनदीन समाजाच्या वहिवाटींत अद्यापि असला पाहिजे अशी बळकट शंका आल्यावरुन तो शोधून काढण्याचे काम गेल्या शतकाचे शेवटी व चालू शतकाचे आरंभी धाडसी आणि सहानुभूतिसंपन्न शोधकांनी चालविलें होतें. अशापैकी एक संशोधक बाबू नगेद्रनाथ बसू हे ओरिसा प्रांतांतील मयूरभंज संस्थानचे मालक महाराज श्री रामचंद्र भेज देव ह्यांच्याबरोबर त्या संस्थानांतील जंगलांत फिरत होते. ते खिचिंग नावाच्या खेड्याजवळ पोहोचले असता त्यांना 'पान' नावाच्या अस्पृश्य जातीच्या काही तरुण पोरांनी मनोहर गाणी गाऊन दाखविली. धर्मगीता नांवाच्या जुन्या ग्रंथांशी त्याचा संदर्भ जुळल्याने नगेंद्र बाबूंना साश्चर्य आनंद झाला. त्यानंतर त्यांना कांही वृद्द माणसें भेटलीं. त्यांनी जुन्या बुद्धानुयायी पाल राजांची गाणी गाऊन दाखविली. अशा रीतीनें ह्या ओसाड जंगलांत विस्मृतिगर्तीत दडपून गेलेल्या बौद्ध धर्माचा आकस्मिक सुगावा लागल्यामुळें या बाबूंनी आपला शोव पुढे नेटाने चालविला. बडसाई आणि खिचिंग गांवांजवळ त्यांना ओरिया भाषेंतील कांही हस्तलिखित पोथ्या, एक जुना बौद्ध स्तूप, धर्मराज आणि शीतला ह्या महायान बौद्ध पंथाच्या मूर्ति व इतर खाणाखुणांचा शोध लागला. पण सर्वांत आश्चर्यांची गोष्टी ही की ह्या सर्व गत वस्तु आजवर भक्तीने संभाळून ठेवल्याचें सर्व श्रेय नगेंद्रबाबू बाथुरी अथवा बाउरी या हीन व अस्पृश्य मानिलेल्या जातीलाच देत आहेत !


सोळाव्या शतकांतील ओरिसाला राजा प्रतापरूद्र ह्याच्या कारकीर्दीत बलरामदास नांवाचा कवि होऊन गेला. हा प्रतापरुद्राच्या छळाला भिऊन आपला बुद्ध धर्म छपवून ठेऊन हिंदूधर्मांत मिळून मिळवून रहात होता. त्याने आपल्या 'गणेश विभूति' नांवाच्या ओरिसा भाषेंतील काव्यावर आपणच 'सिद्धांताडंबर' नांवाची टीका केली आहे. त्यांत त्याने बाथुरी जातीची पूर्वपीठिका अशी सांगितली आहे.
खालील उता-यावरुन आपल्यास जातां जातां ओरिया भाषेशीं मराठीचे किती साम्य आहे हेंही दिसेल.


निराकार दक्षिणरु विप्र होए जात।।
उत्तर अड्गरु जान गोपाल सम्भूत ।।१७।।


वदन अंतरे विश्वमित्र मुनि कहि ।।
ताहांकु अडंरे वाउरि जात होइ ।।१८।।


तार तहु तेर सुत हइल जनम ।।
ताहार पत्नीर नाम पद्म लया जान ।।२५।।


कनिष्ठ पत्नीरे चित्र उर्वशी तार नाम ।।
गंधकेशी वलीण तार दुतिय भार्य्या जान ।।२६।।


वायुरेखा वलिण से चतुर्थक काहि ।।
वार सुत जन्म हेले चारि पत्नी तेहि ।।२७।।


भावार्थ : निराकाराच्या (शून्य ब्रह्माच्या) उजव्या कुशींतून विप्र जन्मले, डावीतून गोपाल, तोंडांतून विश्वामित्र, त्याच्यापासून बाउरी जात उभ्दवली. पद्मालया, उर्वशी गंधंकशी आणि वायुलेखा अशा चार पत्नीपासून विश्वमित्राला १२ पुत्र झाले.


भाष्य : एवे वाउरि वारपुत्र नामक हिवा ! पद्मालयापुत्र दुलि वाउरि अटत्नि ब्राह्मणसड्डे वेद पदु यान्ति । ब्राह्मण ज्येष्ठ वाउरि कनिष्ठ ।
ए पदुथिले राजा प्रतापरुद्रड्ग ठारु गोप्य करि रखि अच्छन्ति ।...
पद्मालयापुत्र वायोकांडी परमानन्द भोइ राधी शासमल ।
Modern Buddhism, पान १५-१६


ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणांत विश्वमित्राचे पुत्र शंबर असे म्हटलें आहे. त्याच्याशी वरील माहितीचा संदर्भ नगेंद्र बाबूंनी जुळविला आहे. पण ह्याशिवाय या बलरामदासाच्या मताला दुस-या कुठल्याही हिंदु अथवा बौद्ध पुराणांचा आधार नाही असें नगेंद्र बाबू कबूल करितात.


पुढे आणखी 'गणेश विभूती'त म्हटलें आहे की :
 

 

पदमालया तिन पुत्र ज्येष्ठ से प्रमाण ।
विष्णुंड्ग सड्गते से -हुयुत्नि सम्माषणं ।।


सड्गासुर मारि प्रभू सड्भ ताड्कु दिले ।
पज्भजन सड्भ तुम्म सम्माल वोइले ।।


आउ नव भाइ अश व्कुइ न जुगाइ ।
विचारि जानिलेटी संशय केली सेहि ।।१२।।


अर्थ : पद्मालयाच्या पांच पुत्रांना विष्णूने आपला शंख दिला पण इतर तीन बायकांच्या मुलांना मात्र विष्णूने आपणास स्पर्शही करु दिला नाही.


ह्या वाक्यांतील सड्भ ह्या शब्दाचा अर्थ नगेंद्रबाबू बौद्ध संघ असा करतात व शून्य पुराणांत सड्ख हे पंद संघ ह्या अर्थाने योजिलेले आढळते. असा दाखला देतात. अशिक्षितांमध्ये संघाचा अपभ्रंश संख होणे सहाजिक आहे. वरील वाक्याचा लाक्षणिक अर्थ असा होईल की बाउरी जातीच्या प्रमुख ग्रामणीने आपल्या शत्रूंचा संहार करुन संघाचे आधिपत्य मिळविले. म्हणजे बाउरी जातीचाच बौद्ध धर्मांत शिरकाव होऊन ते मान्यतेला पावले. बाकीच्या शबर जाती बौद्ध धर्माचा स्वीकार न करितां तशाच जंगली स्थितीत राहिल्या. (Modern Buddhism, पान २०)


'गणेशविभूतीं' त गणेशाला पुढे बाउरी जातीसंबंधी हेंही गुह्य सांगण्यांत आलें आहे : -
 

 

कलियुगे न छुइव । वाउरि छुइले सकल पातक क्षय हव ।
वोलि विष्णुमाया करि गोप्य कोरि रखि अच्छन्ति ।
शुन हे गणेश वड गाहनए गुप्त करि थुइवु ।
एथि सकाशरु वाउरिगार काटिले ब्राह्मण निभाइ पारन्ति नहि ।
मर्घ्ना पातक क्षय हव वोलि शाप्यकु मानियान्ति ।। ( अध्याय १२)


अर्थ : - कलियुगांत बाउरींना शिवू नये; शिवल्यास सकळ पापांचा क्षय होतो, म्हणून जो तो त्यांना शिवेल यासाठी त्यांना अस्पृश्य ठेवण्यांत विष्णूची माया आहे.


वर सिद्धांतांडबरामध्ये सांगितल्याप्रमाणे हल्लीच्या बाथुरी उर्फ बाउरी ह्या अस्पृश्य जातीचा ब्राम्हणांशी कांही सबंध आहे काय ह्या प्रश्नाला नगेंद्रबाबू खालील उत्तर देत आहेत - "मयूरभंज संस्थानांत शोधाअती आम्हाला जी अनेक प्रकारची सामग्री मिळाली आहे तीवरुन हल्लीची बाथुरी ही जात खरोखरी आर्यवंशीय असावी असें आम्हांस वाटतें. ह्या प्रांतांत ही सामग्री भरपूर आहे. मयूरभंज संस्थानांतील सिंहलीपाल दुर्गावरील सुंदर इमारतीचे अवशेष, प्राचीन 'आठवा देऊळ' नांवाचे दगडी मंदिर, जोशीपूर किंवा दासपूर नांवाचा चिरेबंदी किल्ला वगैरे पुराव्यांवरुन बाथुरी हे आर्य आहेत, इतकें नव्हे तर ह्या प्रांती हे लोक पूर्वी पराक्रमी राजकर्ते, मंत्री व सेनानी होते, अशी जी थोड्याच दिवसांमागे समजूत होती ती साधार आहे, असें दिसतें. अद्यापि हे लोक ब्राह्मणांप्रमाणे जानवीं घालतात, दहा दिवसांचे सुतक पाळतात, श्राद्ध करितात, आणि ह्यांच्या श्राद्धांचे जेवण ब्राह्मण आणि वैश्यही जेवतात. ह्या जातीच्या प्रमुखाला आजही महापात्र हा किताब आहे. खरा बाउरी ब्राह्मणच्याही हातचें खात नाही; त्याच्या जातीमध्ये त्याला फारच मान आहे. ह्याच्या पूर्वजांनीच हल्लीच्या भंजराजाला राज्यस्थापनेमध्ये मदत केली. पूर्वी ह्या राजाचे २२ सामंत होते. त्यांत सिंहलीपाल, आदिपूर, दासपूर आणि करुंजा येथील अनुक्रमे चार जमीनदार बाउरी जातीचे होते. ह्यांना भंजांकडून रुप्याच्या छत्रचामराचा मान होता. पण आता ह्या सर्व गत गोष्टी झाल्या. हे सर्व कर्जबाजारी होऊन खायाची भ्रांत,अशी कठीण स्थिती झाली आहे. भोंवतालच्या कोळी, सांताळ लोकांत मिसळून त्यांच्याच चालीरीती आचरुं लागले आहेत." (Modern Buddhism पान ३२)


जी अवस्था बाउरींची पश्चिम बंगाल व ओरिसामध्ये तीच पोंडांची (पौंड १) मध्य बंगाल्यांत आणि नामशुद्रांची (चांडाल) पूर्वबंगाल्यांत आहे. इ. स. १९०१च्या खानेसुमारीत ह्या दो जातीसंबंधाने पुढील उल्लेख आहे :-


" नामशूद्र १८,६१,००० आणि पोड ५,००,००० आहेत. पण ह्यांच्यापैकी फार मोठी संख्या मुसलमान झाल्याने ह्यांचा खरा विस्तार दृष्टीआड झाला आहे. पूर्व बंगाल्यांत १, ०५, ००,००० मुसलमान आहेत. पैकी निदान ९,००,००० ह्याच जातींतून गेले असावेत. दंतकथेवरुन ह्यांचा संबंध प्राचीन पौंडवर्धन राजाशी पोहोचतो. ह्याची राजधानी खारा तोय नदीवर होती. ह्यांनी आपल्या पूर्वीच्या बौद्धधर्माची अद्यापि आठवण राखिली आहे. धर्मराज व धर्मठाकूर ह्या रुपाने ते अद्यापि बुद्दाचीच पूजा करितात. ह्यांचा वंश बहुश: मोंगली (मांगोलियन) आहे. हे प्रथम ब्रह्मपुत्रानदीच्या दरींतून ईशान्येकडून उत्तर बंगाल्यांत शिरले असावेत. तेथेच त्यांचे राज्य असावे. तेथून मग कोच, राजत्रंशी, इत्यादि लोकांनी त्यांना हुसकून लाविल्यामुळे ते खाली समुद्रकिना-यापर्यंत आले असावेत. गेल्या १० वर्षांत नामशूद्र शेंकडा १० व पोड शेंकडा ११ ह्या प्रमाणांत वाढले आहेत."


सन १९२३ आणि सन १९२८ ह्या दोन सालीं मी ब्राह्मसमाजाच्या प्रचाराकार्यासाठी पूर्व बंगाल्यांतील जेसोर जिल्ह्यांत फिरतीवर होतो. दोन्ही वेळा सुमारे महिनाभर ह्या नामशूद्रांच्या खेड्यांत त्यांच्याशी अगदी मिळून मिसळून राहिलों. ह्या लोकांत आमच्या 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'च्या शाळा व हायस्कूलें त्यांनी स्वत: चालविलेल्या ब-या चालल्या आहेत. ह्यांच्या धार्मिक उपासना व समाजिक चालीरीती. ह्यांची नावें व गृह्यसंस्कार वगैरेचे बारीक निरीक्षण केल्यावरुन, ही मोठी जात पूर्वी बौद्धधर्मानुयायी असून ह्यांनी राजवैभव एक काळी चांगले भोगिले असावे अशी माझी खात्री झाली. हे हल्ली शेतीचा धंदा यशस्वी रीतीने करितात. विशेषत: ताडीच्या झाडांपासून गुळ करण्याचे कारखाने घरोघरी दिसले.


असो. एथवर या उत्तरयुगांतील टप्प्याची लक्षणें सांगितली. ह्या युगांत अस्पृश्य समाजांत जी भली मोठी भर पडली ती प्राचीन युगातल्या वर्णव्यवस्थेमुळे किंवा मध्ययुगांतल्या ग्रामसंस्थेमुळे नसून भलत्याच अवांतर कारणांनी म्हणजे हिंदूच्या दुष्ट राजनीतीमुळे व आत्मघातकी कोतेपणामुळे किंवा वृत्तिमात्सर्यांमुळे पडली आहे. दक्षिण हिंदुस्थानांत बुद्धधर्माचा नायनाट इ.स. ८००-९०० या शतकांत झाला तसा तो उत्तर हिंदुस्थानांत १२००-१५०० च्या दरम्यान झाला. दक्षिणेंत हा अत्याचार शैव आणि वैष्णव पंथांनी केला पण उत्तरेस त्या विघ्वंसाचें अपश्रेय जें एकट्या मुसलमानांच्याच कपाळावर कांही बंगाली पंडित व संशोधक चिकटवू पाहतात, त्याची मात्र खात्री पटत नाही.


मुसलमानांचे आगमन केवळ निमित्तमात्र होते. दक्षिणेकडे हे निमित्तही कोठे दिसत नाही. त्या अर्थी उत्तरेकडेही ह्या निमित्तावर फारसा भर इतिहाससंशोधकांनी ठेवून चालवयाचे नाही. मुसलमानांनी फार तर पुष्कळशा बौद्धांची कत्तल केली असेल  व पुष्कळ्यांना जबरीने बाटविले असेल. पण बाकी उरलेल्यांना अस्पृश्य करा आणि गांवाबाहेर ठेवा असा कांही  हिंदु वरिष्ठ वर्गांचा त्यांचा आग्रह असणें शक्य नाही. ह्या बाबतीत महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री यांचे स्पष्टोद्वार फारच मार्मिक आणि निर्भीड आहेत. ते म्हणतात की मुसलमान आले तेव्हा पूर्व आणि उत्तर हिंदुस्थानांतील समाजाचा बौद्ध धर्मीय जातीच वरिष्ठ आणि वजनदार असा वरचा भाग होत्या. म्हणून त्याच मुसलमानांच्या डोळ्यावर आल्या. त्यांची अशी वाताहत झाल्याबरोबर दुराग्रही ब्राह्मणांनी तत्कालीन शिल्लक उरलेल्या हिंदू राजवटींतून आपलें वर्चस्व वाढविण्याकरिता मुसलमानांच्या छळांतून जिवंत उरलेल्या बौद्ध बहुजनसमाजाला बहिष्कृत करुन कायमचें दडपून टाकिलें. सन १९२१ ऑक्टोबरच्या Dacca Review ( 'डाक्का रिव्ह्यू') नांवाच्या मासिकाच्या अंकांत हरप्रसाद शास्त्री पुन: लिहितात की, "ज्यांना हल्ली डिप्रेस्ड क्लासेस असें लेखण्यात येतें, त्या जाती एकेकाळीं बंगाल्यात राज्य करीत असलेल्या - नव्हे साम्राज्य भोगीत असलेल्या बौद्ध जातींचेच अवशेष आहेत... नेपाळांतल्या दाखल्यावरुन असें दिसतें की बंगाल्यांतील आजचे तिरस्कृत वर्ग कांही शतकांपूर्वी बौद्धधर्मी असून तेव्हा ते हिंदूधर्मीयांशी जोराची स्पर्धा करीत असावेत. मुसलमानी स्वारीचा धक्का ह्यांनाच अधिक जाणवला ह्याचें कारण बौद्ध हे राज्यकर्ते होते आणि ब्राह्मण वाचले ह्यांचें कारण त्यांना त्या वेळीं कसल्याही प्रकारचें महत्व नव्हते.' शास्त्री महाशय स्वत: ब्राह्मण असूनही ते जोराजोराने आज गेले ३० वर्षें हा आपला सिद्धांत प्रतिपादन करीत आहेत. नेपाळांतील त्यांचा दाखला विशेष रीतीने लागू पडतो, तो असा की, "तेथील बौद्धधर्मीयांचे राज्य गुरखे नांवाच्या हिंदु क्षत्रियांनी बळकाविल्यावर तेथील ब्राह्मण आणि क्षत्रिय वृत्तीचे लोक तेवढे सारे हिंदू बनून बाकी उरलेल्या व्यापारी, कारागीर आणि श्रमोपजीवी जाती एक जात जशाच्या तशाच बौद्धधर्मीय उरल्या आहेत. त्याचप्रमाणे बंगाल्यांत नेपाळच्याही वर मजल गेली आहे. म्हणजे वरिष्ठ वर्ग मुसलमान अथवा हिंदू बनून उरलेल्या वैश्य, शूद्र जाती अनाचरणीय, बहिष्कृत आणि तिरस्करणीय झाल्या आहेत. ते खरोखरीच हीन नसून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने अंत्यज आहेत." शास्त्री महाशयांचा हा सिद्धांत खरा असून ध्यानांत घेण्याजोगा आहे. बंगाल्यांत जो अत्याचार ब्राह्मणांना मुसलमानांच्या वावटळीत करता आला तो अत्याचार द्राविड देशांत जैन राजांना बाटवून तेथील शैवाचार्यांनी केला, ह्या कर्नल ऑल्कॉट यांच्या झणण्याला विजयनगर कॉलेजमधील दोन ब्राह्मण अध्यापकांकडून अर्ध्या अधिक पुराव्याचें पाठबळ मिळत आहे. पूर्वीच्या दोन युगांतील प्रकार घडला असेल तसा असो. पण बुद्धोत्तरकालीन ह्या तिस-या युगांत मात्र केवळ दडपशाहीनेच अस्पृश्यतेच्या पेवांत आजकालची भली भयंकर भर पडली हें उघड दिसतें.


आधुनिक युग डोळ्यांसमोरच आहे. आता ह्या डोळस युगांत मागील पापांचे नुसते संशोधनच नव्हे तर निश्चित गणनाहि दर दहा वर्षांला सार्वजनिक खर्चाने चालू आहे. ह्या शिरगणतीच्या रिपोर्टावरुन ह्या भरतखंडाचा निव्वळ सहावा हिस्सा अस्पृश्य ठरला हें जगजाहीर झालें आहे. हा सहावा हिस्सा एकदम आणि पूर्वीपासून स्वयंसिद्ध नसून तो कोणत्या कोणत्या टप्प्यांनी बनत आला आहे, हें उपलब्ध प्रमाणांनी संक्षेपत: व ढोबळ मानाने निर्दिष्ट करण्याचा वर प्रयत्न करण्यांत आला आहे.


पुढील ६ व्या प्रकरणात ब्रह्मदेशांतील अस्पृश्यांची काय स्थिती आहे तें पाहूं.