प्रकरण सहावे - ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग

ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे मनांत आणून मी जेव्हा इ. स. १९२७ च्या फेब्रुवारीत कलकत्त्याहून निघालों, तेव्हा माझे मनांतील मुख्य उद्देश केवळ बौद्ध धर्मांचे साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणाने साधावा म्हणून इतर माझे व्यवसाय आणि अभ्यास कांही काळ तरी बाजूस ठेवावेत, असे मला वाटत होतें. पण मी जेव्हा या विचित्र देशांत संचार करु लागलों, तेव्हा प्राचीनवस्तुशास्त्र, तुलनास्मक भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादि ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनी मजवर एकदम हल्ला चालविला. ब्राह्म धर्माचा प्रचारक या नात्याने तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन मला आजन्म करणें भाग आहे. आणि वरील शास्त्रें तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदी हद्दीवरची व त्याशीं सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून अगदी हद्दीवरची व त्याशी सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून, विशेषत: इतक्या भिन्न परिस्थितींत आल्यावर, स्वतः अलिप्त राहणें मला फार कठीण पडलें.


ब्रह्मदेशांत हिंदुस्थानांतला जातिभेद मुळीच नाही, ही गोष्ट खरी आहे. तेवढ्यावरुन येथे कोणत्याही प्रकारचा बहिष्कृत वर्ग मुळीच नाही, किंवा पूर्वी नव्हता, असा माझा समज होता. इतकेंच नव्हे, तर या देशांत पुष्कळ वर्षे राहून वरवर पाहणाराचाही असाच समज असलेला मला दिसून आला. पण खरा प्रकार असा नसून, अगदी अलीकडच्या काळापर्यंत या देशांत बहिष्कृत स्थितींत निदान एक हजार वर्षे तरी खितपत पडलेले चार पांच तरी मानववर्ग मला आढळले. श्वे यो या टोपणनांवाच्या एक इंग्रजाने लिहिलेल्या Burman-His Life and Nation या इंग्रजी ग्रंथांत मी जेव्हा या निरनिराळ्या बहिष्कृत दास-वर्गांचे वर्णन वाचिलें तेव्हा मला फार आश्चर्य वाटले. जातिभेद नसताही बहिष्कृत वर्ग असू शकतो, ही गोष्ट अमेरिकेंतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानांतील सामान्य लोकांचे तेथील निग्रोशी जें वर्तन घडतें व दक्षिण आफ्रिकेंतील गौरकार्याचे इतर वर्णीयांशी जें वर्तन घडतें, तें ज्यांनी पाहिलें आहे, त्यांना सहज पटण्यासारखी आहे.


गेल्या वर्षी भारत-इतिहास-संशोधक-मंडळापुढे 'अस्पृश्यतेचें मूळ आणि तिचा हिंदुस्थानांतील विकास' या विषयावर मी माझा निबंध वाचला. तेव्हापासून या विषयाचा मी अधिकच शोध करीत आहें. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गांची मला जी माहिती शोधाअंतीं मिळाली व प्रत्यक्ष निरखिली, तिच्यामुळें माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपाने देत आहे.


ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम ब्रह्मदेशांतील गुलामगिरीच्या संस्थेंत आहे. ब्रिटीश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशांत इ. स. १८८५ सालीं पूर्णपणे झाली. यापूर्वींच्या स्वराज्यांत या देशांत गुलामगिरीची संस्था होती. ती तेथे किती पुरातन होती हें ठरविण्याची निश्चित साधनें तूर्त उपलब्ध नाहीत. अनेकविध सामग्री जमवून मि. जी. ई. हावें, आय.सी.एस. यांनीनुकताच एक ब्रह्मदेशाचा नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे. त्यांत त्यांनी इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभी सुरु झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे. हे घराणें अनिरुद्ध नांवाच्या पराक्रमी थोर पुरुषाने स्थापिले. या देशांत मन्वंतर घडवून आणण्यासाठी अनेक राष्ट्रीय हिताचीं जी कामें ह्या राजाने केली. त्यांत देशांतील बौद्ध धर्मांची सुधारणा करुन मोठमोठी बौद्ध देवस्थानें बांधिली, हे एक काम होय. ही देवळे बांधण्यासाठी खेड्यांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीने धरुन आणून गुलाम करुन त्यांच्याकडून काम घेतलें. याशिवाय कायमच्या गुलामगिरीचें दुसरें एक कारण ब्रह्मदेशांत असें आहे. देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदारीचीं कामें करणें, हे गुलामांचेचं काम आहे. कित्येक भाविक लोक गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत. पण साधारणपणें राजाज्ञेने हा जबरीचा गुरवपणा खेड्यांतून धरुन आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईंत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यांत येत असे. मि. हावें यांनी पान ३३१ वर एक इ.स. ११७९ च्या शिलालेखाचा उतारा दिला आहे. त्यांत 'अभिनंदथू नांवाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थाने एक मोठें देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठी स्वत:ला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिलें', असा उल्लेख आहे.


अशा देवळी गुलामांवर व त्यांतल्या त्यांत लढाईंत जिंकून आणिलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे. त्यांच्याशी इतर साधारण स्वतंत्र समाज मिळून मिसळून राहत नसे. म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळीच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत. व घरकामाकरिता ठेविलेल्या गुलामांना जरी समाजांत वावरण्यास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यांत येत असे. याप्रमाणे गुलामगिरींतून ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम झाला असावा.एकंदरीत ब्रह्मदेशांतील हल्लीची धार्मिक संस्कृति व कांही अशी घरगुती व सामाजिक संस्कृतीही हिंदी संस्कृतींतून आली आहे, असें दिसतें. निदान कांही वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्थानातूनच गेली असावी, असें म्हणण्यास हिंदी बौद्ध संस्कृतीचाच पुरावा नसून इतरही असा पुरावा आहे की, हल्लीही जे हीन स्थितींतले बहिष्कृत वर्ग तेथे आढळतात, त्यांची संडाला, डून संडाला, तुबायाझा अशीं जीं नावें आहेत. ती हिंदी भाषेंतून तिकडे गेलीं आहेत. ती नावें चंडाल, डोम चंडाल, अशुभराजा या हिंदी नांवांचेच अपभ्रंश होत, यांत संशय नाही. संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचे उच्चार ब्रह्मी लोकांना नीट व करतां आल्यामुळें त्या भाषेंतील च श र या अक्षरांच्या उच्चारांचा ब्रह्मी भाषेंत अनुक्रमें स त य असा विपर्यास व्हावा, असा ब्रह्मी अपभ्रंशाचा नियम आहे, त्यावरहुकूम ब्रह्मी बहिष्कृत वर्गांची नांवें हल्ली तेथे प्रचारांत आहेत. अशुभराजा यांतील पहिल्या अचा लोप झाला व वरील नियमाप्रमाणे तुबायाझा असें शेवटलें नांव सिद्ध झालें आहे.


ब्रह्मदेशांत ब्रिटीश राज्य स्थापन होईपर्यंत खालील पांच प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.


(१) युद्धांत जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळातील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यांत आलेलें असे. यांना फयाचून हें नावं आहे. फया हा शब्द बुद्ध या शब्दाचा चिनी भाषेंतून आलेला अपभ्रंश आहे. बुद्ध-बुढ-भूर-फुर-फया अशी ही अपभ्रंशपरंपरा आहे. फया हा शब्द ब्रह्मदेशांत बुद्ध त्याची मूर्ति, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस या सर्वांबद्दल उपयोजिला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.


(२) स्मशानांतील मार्तिकादि अशुभ संस्कारांशी संबंध असलेलीं, थडगी खणण्याची व ती सांभाळण्याची वगैरे हीन कामें करणारे ग्रामबाह्य वर्ग यांना तुबायाझा ( अशुभराजा), संडाला, डून संडाला अशीं नांवें आहेत.


(३) केवळ भिकेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनी पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एकदा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले यांना केबा असें नांव आहे. केबा हें नांव तुबायाझानाही लावण्यांत येते, कारण तेही भीकच मागतात. के=मदत, वा=हो (संबोधन). 'मला मदत करा', असें म्हणत भीक मागणारे असा या नांवाचा मूळ अर्थ आहे.


(४) माफीचे भयंकर गुन्हेगार - अशा गुन्हेगारांना पूर्वी स्वराज्यांत राजाच्या विशेष कृपेने किंवा इतर कारणांनी माफी मिळून त्यांना पोलीसचें, जेलरचें, फांशी देण्यांचे वगैरे तिरस्कृत कामे आणि अधिकार मिळत असत. त्यांना पॅगवे म्हणजे पोलिस, लेयाटों=चोपदार, छडीदार अशी नांवें असत. अशा अधिका-यांना जनतेमध्ये मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयी सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.


(५) ह्याशिवाय तु-डै-डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वी असे. व यांचा एक लहान गाव मंडळालेपासून १०-१२ मैलांवर आहे, असें माझे ऐकण्यांत आलें. पण प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास मला वेळ मिळला नाही. ह्यांचा समावेश वरील दुस-या वर्गांत मी केला असता, पण हल्ली हे फारसे ग्रामबाह्य नाहीत, असेंही मी ऐकलें.


वरील पांचही बहिष्कृत वर्गांतील लोकांची हल्लीची संख्या हिंदुस्थानांतील बहिष्कृतांच्या मानाने फारच थोडी म्हणजे फार तर सा-या ब्रह्मदेशांत ५/६ हजार असेल. यांची स्थितीही हिंदुस्थानांतल्या इतकी करुणास्पद नाही. हे आपलें ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजात छपून गेल्यास हल्लीच्या राज्यांत कोणी पर्वा करती नाहीत. हे जरी आपल्या मूळ गावींच बहिष्कृत स्थितींत राहिले तरी, व पूर्वीदेखील, हिंदुस्थानांतल्या इतक्या कडक रीतीने यांना अस्पृश्य मानण्यांत येत नसे. तरी पण त्यांना गावांत येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळण्याला परवानगी नसे. म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्तेंत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गावोगावीं मुद्दाम जाऊन पाहिले. ब्रह्मदेशांत कडक अस्पृश्यता नव्हती-निदान हल्ली नाही-हें खरें असलें तरी तेथील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा भेटीव्यहार पूर्वी होत नसे व आताही होत नाही; मग रोटीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्टच नको. हल्ली देखील कोणी उघडपणें आपलें मूळ वरील चार पांच प्रकारापैकी एकांत आहे, असें सांगेल, तर त्याच्याशीं ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासही तयार नाही. म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगी समानतेने बहिष्कृतांस आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाही. ब्रह्मदेशांतील पुराणमतवाद हिंदस्थानांतल्यापेक्षा कमी दृढमूल आहे व जो आहे तो झपाट्याने मावळत आहे, तरी पण तो मुळीच नव्हता किंवा नाही असें नांही. म्हणून तेथील बहिष्कृत वर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.


वरील पांचही प्रकारच्या बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनांत जो आढळला तो मी संक्षेपाने पुढे देत आहें. ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाचा आहे. उपलब्ध साधनसमाग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशीं निकट संबंध भासत आहे आणि तो रंजक व तसाच बोधकही आहे.


फयाचून : ह्या नांवाचा अर्थ देवळी गुलाम असा आहे. ब्रह्मदेशांतील देवस्थानें अत्यंत पवित्र मानलीं जातात; इतकीं की, युरोपियनांना देकील पादत्राण घालून देवळांतच नव्हे तर भोंवतालच्या विस्तीर्ण आवारांतही पाय टाकण्याची छाती होत नाही. अशा बाबतींत युरोपियनांचेही खू पडले म्हणून पादत्राण घालून मंदिरांतच नव्हे तर प्राकारांतही प्रवेश करण्यासंबंधी सरकारी ठराव आणि वटहुकूम मोठमोठ्या पाट्यांवर आवारापासून कांही अंतरावर जाहीर केलेले आढळतात. देवळें पवित्र तरी देवळी गुलाम अपवित्र, हें मोठे कोडेंच मला पडले! शोध करिता देवळी गुलामच नव्हे तर देवळांत वाहिलेल्या इतर, फळें, फुलें, सुगंधी पदार्थ व नैवेद्य, इत्यादि सर्वच वस्तु मनुष्यांना अग्राह्य आहेत. ह्या न्यायाने फयाचून म्हणून जो देवळी गुलाम वर्ग आहे तोही पूर्वी अग्राह्य असला पाहिजे. तो कालांतराने त्याज्य व नंतर अपवित्र मानला असणें अगदी संभवनीय आहे. ह्या गुलाम वर्गांत पूर्वी बहुतेक धरुन आणलेले राजकैदी असत. ह्यांचें एक उदाहरण अत्यंत हृदयद्रावक पण अगदी इतिहासप्रसिद्ध आहे, तें असें.


दक्षिण ब्रह्मदेशांत मोलमेन शहराचे उत्तरेस २०/२२ मैलांवर किना-यालगत थटून म्हणून एक इतिहासप्रसिद्ध प्राचीन राजधानीचा गांव आहे. तेथे इ. स. च्या ११ व्या शतकाच्या मध्यसमयी मनुहा नांवाचा तेलंग राज राज्य करीत होता. ह्या प्रांतांत द्रविड देशांतून कांची येथून गेलेला 'हीनयान' बौद्ध धर्म जोरावत होता. उत्तरेकडे ऐरावती नदीचे काठी पगान येथे अनिरुद्ध नांवाच्या ब्रह्मी जातीच्या राजाने जेव्हा पहिली ब्रह्मी बादशाही स्थापिली, तेव्हा दक्षिणेंत थटून येथे मनुहा राज्य करीत होता. अनिरुद्धाला उत्तरेकडील भ्रष्ट बौद्ध धर्मांची सुधारणा करावयाची होती. थटूनकडून एक नामांकित बौद्ध भिशु पगान येथे जाऊन अनिरुद्धाच्या राष्ट्रीय कार्यांत मार्गदर्शक झाला. त्याने, थटून येथे बौद्ध त्रिपिटक ग्रंथाच्या प्रती आहेत, त्या मिळविण्याचा अनिरुद्धास मंत्र दिला. सामोपचाराने मागन मनुहा त्रिपिटक ग्रंथ देत नाही; म्हणून त्यावर रागावून अनिरुद्धाने मनुहाच्या राज्यावर मोठी चाल करुन त्रिपिटकच नव्हे तर त्याचें अक्षरश: सर्वस्व हरण केलें. म्हणजे त्याच्या राज्यांतील सर्व मौल्यवान चिजा ऐनजिनशी आपल्या राज्यांत नेल्या, इतकेंच नव्हे तर प्रजाही गुलाम म्हणून आपल्या राज्यांत नेली. तेव्हा पर्यंत दक्षिण ब्रह्यादेशांतील संस्कृति दक्षिण हिंदुस्थानांतील आंध्र आणि द्राविड देशांतून दक्षिण ब्रह्मदेशांत हीनयान बौद्ध संस्कृतीचे मार्गाने गेली होती. ती या युद्धापुढे उत्तर ब्रह्मदेशांत पसरू लागली. थटूनचे बौद्ध ग्रंथ, बौद्ध भिक्षू, आचार्य आणि कारागीर नेले इतकेंच नव्हे, सर्व राजघराणें आणि दरबारही गिरफदार करुन पगान येथे नेण्यांत आलें. शेवटी त्या थटून राजघराण्यासह सर्व नामांकित प्रजेला पगान येथे बांधलेल्या असंख्य नवीन पगोडांमध्ये बहिष्कृत देवळी गुलाम म्हणून कायमचे वंशपरंपरा नेमण्यांत आलें. मी थटून आणि पगान हीं जुन्या संस्कृतीची दोन्ही ठिकाणें शिल्पशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा तीन्ही दृष्टीने निरखून पाहिली. दक्षिण ब्रह्मदेशांत ब्रिटिशांचा अंमल जसा इ.स. १८२५ चे सुमारास बसला, तसाच तो उत्तर ब्रह्मदेशांत १८८५ साली बसून सर्व ब्रह्मदेश नव्या मनूंत आला. ह्या साठ वर्षांच्या अंतरामुळे मला दक्षिण देशांत बहिष्कृत वर्ग कोठेच आढळला तो पाहण्यास उत्तरेकडे पगानला जावें लागलें. पगान येथील बहिष्कृत वाड्यांत मनुहा राजाचें घराणें, वाडा व त्याचा हृदयस्पर्शी लवाजमा अद्यापि आहे. शेवटचा पुरुष उबाल्विन हा २६ वर्षे वयाचा बाणेदार तरुण व त्याची खानदानी वृद्ध आई यांना मी डोळ्यांनी पाहिलें. त्यांची गा-हाणीं ऐकली. न्यऊ ह्या बंदराजवळ श्रेझीगो नांवाच्या मोठ्या राष्ट्रीय पगोडाजवळ एक फायाचूनांचे वेगळें खेडें आहे. त्याचा थजी उर्फ पाटील म्हणून ब्रिटिश सरकारने उ बा ल्विनची नेमणूक केली आहे. कारण तो मोठ्या राजवंशातील पिढीजाद फयाचून आहे !


फयाचून हे लोक लहान मोठ्या देवळांत हल्ली फुलें, माळा, उदकाड्या, मेणबत्त्या विकण्यासाठी दुकानें मांडून बसलेले आढळतात. हा धंदा किफायतीचा असल्याने अलीकडे फयाचून नसलेल्या इतर अंत:कृत लोकांचींही अशी दुकानें आहेत. उलट फयाचूनही आपलें मूळ लपवून व हा धंदा सोडून अंत:कृत वर्गांत सररास मिसळत आहेत. ह्यामुळें खरा फयाचून कोण, हें ओळखून काढणें मोठें मुष्किलीचें काम आहे. विशेष तपशील निरीक्षण नं. ४ ह्यांत पुढे दिला आहे.


तुबायाझा : ह्या नांवांतील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणें 'अशुभ राजा' ह्यासंबंधीं मी एक दंतकथा ठिकठिकाणीं ऐकली ती अशी : एकदा एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली. ती मेलीच, असें समजून तिला स्मशानांत पाठविलें. थडग्यांत उतरवितांना ती जिवंत आहे, असें आढळले. स्मशानांत नेलेली राणी राजाने पुन्हा स्वीकारणें शक्यच नव्हतें. तिला थडगें खणणा-या संडाला जातींतच ठेवून दिलें व तिचे पोटी पुढे जो राजपुत्र झाला त्याला 'अशुभ राजा' हें नाव पडलें. त्याला संडालांचे मुख्य पद मिळून, स्मशानांतील धार्मिक संस्कारांत बौद्ध फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच या राजवंशालाही मिळावी, असें राजशासन मिळालें. ही दंतकथा मला पगान येथील तुबायाझाच्या खेड्यांतील पाटलाने व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेही स्वतंत्रपणें सांगितली. कथा खरी असो नसो, ब्रह्मी चंडाल उर्फ संडाला लोक राजवंशाशी आपला संबंध कसा पोंचवितात, हें ह्यावरून दिसते. मलबारांतील पुलया व चिरुमा ह्यांचाही अन्य रीतीने राजवंशाशीं कसा संबंध येतो, हें मी हिंदुस्थानांत पाहिलेलें मला स्मरलें. तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधी जित नव्हते, असें त्यांचें म्हणणें आहे. हे संडाला, डून-संडाला लोक मणिपूरच्या बाजूने हिंदु संस्कृतीच्या राजाने प्राचीन काळी ब्रह्मदेशांत नेले असावेत. याशिवाय माझा तर्क दुसरा धावत नाही. अलीकडे दक्षिण हिंदुस्थानांतील लक्षावधि, परैया, पुलया इत्यादि अस्पृश्य जातींचे लोक पोट भरण्यासाठी ब्रह्मदेशांत अगदी हीन धंदा करुन राहिले आहेत. ते मुळीच बहिष्कृत नाहीत. पण हे संडाल मात्र प्राचीन काळीं गेलेले अद्यापि तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गांवी थडगें खणण्याचे आपलें जुनें वतनच चालवीत असलेले आढळतात; त्याअर्थी हें प्राचीन हिंदी संस्कृतीचें वतन प्राचीन हिंदी राजांनीच स्थापिलें असेल असें माझे मत आहे. विशेष तपशिलासाठी पुढे निरीक्षण नंबर १ व ३ हीं पहा.


केबा : पूर्वीप्रमाणे हे महारोगी अपंग बेवारशी भिकारी लोक असून मोठमोठ्या देवळांच्या वाटेवर याचना करीत बसलेले आढळतात. असे अपंग याचना करीत बसलेले इतालीसारख्या प्राचीन अमदानींतल्या रोम व इतर क्षेत्राच्या ठिकाणी मी युरोपांतही प्रत्यक्ष पाहिले. आमच्या हिंदुस्थानांतल्या क्षेत्रांतल्या भिका-यांचा येथे उल्लेखही करण्याची गरज नाही हा वर्ग समाजबाह्य आहे, ह्यांत कांहीच नवल नाही. मंडालेपासून ८ ते १० मैलांवर असलेल्या मेंढाई नांवाच्या खेड्याजवळ केबांची मीं एक स्वतंत्र लहानशी वसाहतच पाहिली. ती मीं पुढे एका निरीक्षणामध्यें विस्ताराने वर्णिली आहे.


चौथा वर्ग जो माफीचा गुन्हेगार तो हल्ली ब्रिटिश अमदानींत कोठेच आढळणें शक्य नाही. पूर्वींच्या स्वराज्यात 'राजा कालस्य कारणम्' हे तत्व जोरावर होतें. राजाची वैयक्तिक मर्जी संपादन केल्यावर 'प्याद्याचा जसा फर्जी' तसाच सात खून करुनही आपली हुशारी दाखविणाराला माफी मिळून उलट शहर कोतवाली मिळविणारांची उदाहरणें पाहाण्यासाठी संशोधकाला ब्रह्मदेशापर्यंत लांब जावयास नको. हल्लीच्या कोठल्याही लोकछंदानुवर्ती ब्यूराक्रसीच्या सी.आय.डी. मध्ये असले पाणीदार माफीबहादूर शोधीत बसल्यास मिळणार नाहीत, अशी कोण हमी घेईल? मात्र पूर्वीच्या ब्रह्मी स्वराज्यांत अशा लोकांना दरबारांत जरी वेतन मिळे, तरी तेवढ्यावरुन समाजांत त्यांना मान्यता न मिळतां उलट बहिष्कार पडे, असें मीं ब्रह्मदेशाच्या वाड्प्रयांत वाचिलें आहे. पॅगवे हें अशा पोलीस व जेलर लोकांना नांव पडण्याचे कारण ह्यांच्या गालांवर ह्यांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्याची कायमची निशाणी म्हणून एक गोलाकार शिक्का मारलेला असे. अलीकडच्या कांही गुन्हेगारांना पाश्चात्य सुधारलेल्या समाजाकडून सोन्याच्या तलवारी नजर करण्यांत आल्या आहेत! हा जुन्या नव्यांत एक फरक ध्यानांत धरण्यासारखा आहे. एरव्ही पाणीदार गुन्हेगारांना उगाच शिक्षेंत खितपत न टाकतां आताप्रमाणेंच पूर्वीही कोठे कोठे समाजकार्याला लावण्यांत येत होतें., हें ब्रह्मदेशांतील उदाहरणांवरुन उघड होतें.


तु डैं. डो ह्या पांचव्या वर्गांचें प्रत्यक्ष निरीक्षण करावयाला मला वेळच मिळाला नाही म्हणून त्यांचें जास्त वर्णन मला करतां येत नाही ह्याबद्दल मी दिलगीर आहे.


असों येथपर्यंत मी पांच बहिष्कृत वर्गांचा उल्लेख व वर्णन केलें. ब्रह्मदेशांत जाईपर्यंत व गेल्यावरही कित्येक आठवडे तेथे आमच्या देशांतल्याप्रमाणे ग्रामबहिष्कृत वर्ग असेल, अशी कल्पनाही माझ्या मनाला शिवली नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे अकस्मात मी जेव्हा असे वर्ग कांही विवक्षित प्राचीन ठिकाणीं आढळण्यासारखे आहेत असें ऐकले तेव्हा मी त्याचा फारच जारीने शोध चालविला. दक्षिण ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी अशिक्षित ब्रह्मी लोकांकडून मला त्यांची थोडीबहुत माहिती मिळाली पण तीही उडवाउडवीनेच मिळूं लागली. म्हणून मी उत्तर ब्रह्मदेशांत बौद्ध धर्मांचे खरें साधन पाहावयास गेलों असतां खालील पांच खेडीं मी या निरनिराळ्या वर्गांची वस्तुस्थिति प्रत्यक्ष घरोघर जाऊन निरीक्षण करण्याकरिता निवडून काढिली. त्यापैकी तू- डै-डो या (हलालखोर ) वर्गाचें खेडें मात्र प्रत्यक्ष पाहण्याला मला वेळ मिळाला नाही. पण बाकीच्या चार ठिकाणी मात्र मी चांगल्या सुशिक्षित जाणत्या ब्रह्मी दुभाष्याला घेऊन घरोघरी फिरुन या निरनिराळ्या वर्गातल्या वृद्ध आणि वजनदार लोकांना भेटून त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन व शिवाय प्रत्यक्ष स्थिति निरखून पाहून तयार केलेलीं खालचीं सविस्तर टिपणें लिहिलीं आहेत. तीं माझ्या रोजनिशीवरून येथे थोडक्यांत उतरुन घेत आहें. प्रोम शहराजवळील खेड्यांत मात्र माझी जी खडतर निराशा झाली, ती पुढे दिलीच आहे.


येथे मला एक गोष्ट नमूद करणें अवश्य वाटत हे की, ह्या बहिष्कृत वर्गाची स्थिती आता अगदी झपाट्याने सुधारत आहे. आणखी दहापंधरा वर्षांत, मला दिसलीं तितकीं तरी कुटुंबे मी पाहिलेल्या स्थितींत पुढील संशोधकांस आढळतील की नाही याला मला जबर शंकाच वाटत आहे. फार तर काय, आताही या बहिष्कृत वर्गांना त्यांच्या मूळ नांवाने संबोधणें हें मोठें शिताफीचें व धैर्यांचे काम आहे. ब्रह्मी लोकांचा समाज अत्यंत चिडखोर, उतावळा व तापट आहे. थोड्या कारणावरुन हे लोक वर्दळीला येऊन हातघाई करितात. त्यामुळे दुभाष्याचें काम करुन ही नसती उठाठेव करण्यास मला शांत व समजस माणसें मिळणेंही ब-याच वेळा मुष्किलीचें झालें; व पुष्कळदा अर्ध्या दमाच्या दुभाष्यांनी माझी ऐन वेळीं निराशा करुन माझा बेत ढासळून टाकला. म्हणून माझा सर्व भार माझ्या दुभाष्यावर किंवा वाटाड्यावर न टाकतां अगोदर अनेक उपायांशी खालील ठिकाणच्या लोकांचा विश्वास मला संपादावा लागला. ब्रह्मी लोक जितके उतावळे तितकेच भोळे व दिलदारही आहेत. विश्वास बसल्यावर ते आपले हितगुज आपल्या उलट असलें तरी मोकळ्या मनाने सांगतील, हा भरंवसा मला अंत:कृत आधुनिक सुशिक्षणाने अर्धवट भाजून निघालेल्या ब्रह्मी लोकांच्या समागमाने जो आला नाही, तो तेथील बहिष्कृतांच्याच समागमांत आला. हिंदुस्थानांत काय किंवा कोठेही काय, वरिष्ठ म्हणून गाजलेल्यापेक्षा त्यांनी पायांखाली तुडविलेल्या कनिष्ठ वर्गांतच त्या त्या राष्ट्रांच्या ख-या माणुसकीचीं व स्थानिक स्वभावाची लक्षणे सूक्ष्म संशोधकांना जास्त आढळून येण्यासारखी आहेत. हें मी माझ्या निरनिराळ्या देशांतील आजन्म घेतलेल्या अनुभवावरुन म्हणूं शकतो !


निरीक्षण पहिलें : सगाईन – सोमवार ता. १४ मार्च १९२७ रोजी चौथे प्रहरीं ४ वाजतां सगाईन शहरांतून सगाईन टेकडीकडे जाण्यासाठी आम्ही उं मॉं मॉं चे मोटारींतून निघालो. ऐरावती नदीचे कांठी मंडालेपासून ८ ते १० मैलांवर हें शहर आहे. माझेबरोबर रा. भिडे व वृद्ध ब्रह्मी पेन्शनर गृहस्थ उ. पो. विन हे तुबायाझा लोकांची लहान वस्ती होती. हे लोक स्मशानांतील थडगीं खणण्याचा धंदा व इतर मार्तिकासंबंधी कामें करितात. हे लोक आपणास फयाचून लोकापेक्षा श्रेष्ठ समजतात. फयाचून हे साधारण देवळी गुलाम असून तुबायाझा हे आपण राजवंशांतील आहों असें समजतात; कारण 'याझा' हें यांच्या नांवांतील शेवटलें पद 'राजा' या शब्दाचा अपभ्रंश आहे. 'तुबा' हे 'शुभ' याचा अपभ्रंश आहे. पूर्वीहा शब्द अशुभ असा होता, त्यांतील अ जाऊन शुभ-तुबा हा अपभ्रंश उरला. ह्या राजवंशाने भिक्षेशिवाय दुसरा कोणताच धंदा करतां कामा नये, ह्यामुळें ह्यांना केबा ( मला मदत करा) हें नांवही पडलें. असेंही कोणी सांगतात. वस्ती एकंदरीत स्वच्छ व नीटनेटकी दिसली. तरुण मुलींना लिहितां वाचतां येत होतें. वस्तीच्या मध्यावरील झोपडी चांगली प्रशस्त बंगलीवजा होती. ती म्युनिसिपालिटीने बांधिली आहे. या लोकांनी वस्तींत आपलें स्वत:चें चांगले देवस्थान उभारलें आहे. त्यांत म. गौतम बुद्धाच्या व नाटांच्या (बूत यक्षाच्या) पुष्कळ मूर्ति होत्या. फौजी (बौद्ध भिक्षू ) ह्यांच्याकडे जेवणाला, भिक्षेला व धार्मिक कृत्याला येत आहेत; तरी यांच्यांत विशेष महत्त्वाकांक्षा दिसली नाही. एकंदर स्थिती मागासलेली व करुणास्पद दिसली. माझे बरोबरीचे उपो विन हे वृद्ध व श्रीमंत गृहस्थ असूनही ह्या लोकांबरोबर उघडपणें बसून जेवण्यासही आपण तयार आहों. असें म्हणाले. ह्या लोकांना मी विचारलें की, तुम्ही इतरांप्रमाणें सुशिक्षण मिळवून मोठीं हुद्याची कामें कराल काय? तेव्हा ह्या प्रश्नाचा अर्थच त्यांना कळला नाही. कारण हें कसें घडले? हें अशक्य कोटींतलें त्यांना वाटलें. एकंदर स्थिती अज्ञानाची, आत्मविश्वासाच्या अभावाची व अल्पसंतुष्टतेची दिसली. पुष्कळ अशी हिंदुस्थानांतही हल्ली हाच प्रकार आहे !


निरीक्षण दुसरें : मेंढाई - ऐरावती नदीच्या किना-यावरील अमरपुरा शहराजवळ केबांचा हा गांव ता. १८ मार्च १९२७ रोजीं शुक्रवारी सकाळीं पाहिला. ऐरावतीच्या किना-यापासून पूर्वेकडे एक मैलाच्या आंत मेंढाई नांवाचा सुमारे २५० लोकवस्तीचा एक गाव आहे. त्याला लागून २ व ३ फर्लांगांवर केबांची एक लहान वस्ती आहे. या वस्तीत सुमारे ५ त ७ झोंपड्या व त्यांत २० ते २५ बायका व पुरुष पाहिलें. सर्व कोष्टयाचा धंदा करितात. गुजराथेंत व नागपुराकडे धेड लोक नुसती खादी विणतात पण हे केबा उत्तम रेशमी कापडही विणतात. गुजराथेंत तर ह्या अस्पृश्यांना वणकर असेंच नांव आहे. येथील केबा खाऊन पिऊन स्वतंत्र आहेत. ते केबा हें आपलें नांव सांगत नाहीत म्हणून माझ्या दुभाष्याला त्यांच्या स्वत:विषयीं जातिवाचक माहिती विचारण्याचें धैर्यच होईना. तथापि ते केबाच होते, याची त्याला खात्री होती. पुढे आम्ही मेंढाई गांवांत जाऊन चौकशी केली. मेंढाईचे लोकही सर्व विणकराचा धंदा करीत होते. त्यांतील एका प्रमुख विणकराच्या घरीं गेलों. तो ब्रह्मी राष्ट्रीय शाळेंत थोड्याच दिवसांपूर्वी शिक्षक होता. हा मनुष्य उ. उत्तमाच्या राष्ट्रीयपंथाचा आहे. त्याने सांगितले की, जवळच्या केबांशी मेंढाईचे लोक संबंध ठेवीत नाहीत, तरी त्यांच्यांत व मेंढाईचे लोकांत कांही फरक नाही. रोटी बेटी किंवा भेटीव्यवहार होत नाही, याचा अर्थ ते अस्पृश्य आहेत, असें मुळींच नव्हे. ब्रह्मदेशांत अस्पृश्यता अशी पूर्वींही नव्हती, आता तर मूळीच नाही. अशी विधानें जरी ह्या एका व्यक्तीन केलीं तरी पण या बहिष्कृत लोकांना लग्नामुंजीत किंवा अशा सामाजिक प्रसंगी वरिष्ठवर्ग भेटीव्यवहाराचें आमंत्रण करीत नाहीत, हा खरा प्रकार आहे. पूर्वी त्यांना गावांत येण्याचीही मनाई होती. भिक्षेपुरतें यावें, पुन: बाहेर जावे. पण याची स्थिती आता इतकी सुधारली आहे किंवा मनु पालटला आहे की त्यांना कोणीही उघड आमंत्रण करीत नसलें तरी त्यांना 'दूर सर' म्हणण्याची कोणाचीही छाती नाही. फौंजीच्या शाळेंत त्यांची मुलें जाऊं शकत, पण सरकारी शाळेंत कोठे कोठे जाऊं शकत नाहीत. त्यांच्याकडे फौंजी भिक्षेलाही पूर्वी येत नसत, पण आता येतांना मीच पाहिलें. फार तर काय, त्यांची ग्रामबाह्यता आता पुष्कळ ठिकाणी नष्ट होत चालली आहे. धंद्यामुळे त्यांना पूर्वीच्या रिवाजाला चिकटून राहावे लागतें. स्थान व धंदा बदलला तर कोणी त्यांचे मूळ विचारीत नाही. ते साधारण समाजात मिसळून जातात. हिंदुस्थानच्या व ब्रह्मदेशाच्या बहिष्कारांत हा विशेष फरक आहे की, हिंदुस्थानांत ह्याला केवळ लौकिक व सामाजिक रूप आहे. हिंदूंतील ब्राह्मणादि वरिष्ठ वर्ग बहिष्कार कडकडून पाळतात, पण ब्रह्मदेशांत फौंजी ह्यांची भिक्षा आता सर्सास उघडपणें घेतात व त्यांना शाळांतून शिकवितात. मात्र त्यांना पूर्वी फौंजीची दीक्षा मिळण्यास अडचण पडे, कारण ती दीक्षा देण्यापूर्वी तो मनुष्य स्वतंत्र पुरुष असावयास पाहिजे, दास स्थितींत असून चालायचें नाही, असा नियम आहे. आता हे लोक स्वत:च फौंजी होऊ शकतात ब्रह्मदेशांतला फौंजी व हिंदुस्थानांतला वैदिकी करणारा ब्राह्मण ह्यांत असा हा फरक आहे. यानंतर मेंढाई येथील नाथाचे देऊळ पाहिले. बौद्ध धर्मांपूर्वी ब्रह्मदेशांत नाथ ऊर्फ नाटू म्हणजे भूत अथवा पिशाच ह्यांची पूजा चालत असे. खालील व पुष्कळशा वरील वर्गांतही अद्यापि ती चालू आहे. ही नाथाची देवळे मीं पुष्कळ टिकाणीं पाहिली. या देवळांत दोन मूर्ति आसनावर व एक घोड्यावर अशा बसलेल्या पाहिल्या. हे पूर्वी मुसलमान बंधू होते. किना-यावर यांची नाव बुडाली, तेव्हा ते ब्रह्मी राजाच्या आश्रयाला राहिले. ते मेल्यावर त्यांची ही क्षुद्र देवळें झाली. मुसलमानाशिवाय सर्व लोक त्यांना भजतात. वार्षिक यात्रा होते, तेव्हा या गावासाठी एक रेल्वेचे स्वतंत्र स्टेशन करावें लागतें. या (मुसलमान) नाथांची नांवे श्वेफिजी श्वेफिगल अशी आहेत. कोणी प्रसिद्ध पुरुष अपघाताने मेला तर त्यांचे देऊळ होतें, त्याला नाट म्हणतात.


निरीक्षण तिसरें : पगान - पगानचे दक्षिणेकडे एक मैलावर नदीकाठीं टॉटवा नांवाचे तुबायाझाचें एक स्वतंत्र खेडे आहे. तें पगानच्या स्मशानालगतच आहे. २६ मार्च रोजी शनिवारी सकाळी ९ वाजतां मी प्रिन्सिपाल उ सैन ( लॅकर स्कूलचे ) यांच्यासह तेथे गेलों. गांवांत सुमारे ७० घरें व लोकसंख्या ४०० आहे. ही तपासणी तीन तासांवर बारकाईने केली. गांव नदीकांठावर असल्यामुळे पाण्याची सोय नैसर्गिक आहे. म्युनिसिपालिटीची शहरांतच विशेष सोय नाही, मग ह्यांना कोठून मिळणार? सर्वत्र शाळा नाहीत, पण फौजींच्या शाळांत सर्वांबरोबर शिकण्यास ह्यांना हरकत नाही. तेथे मुलांमुलींचा भेद नाही. पण फौजीच्या मठांत मुलींना शिकता येत नाही. येथे भिक्षुणीचा मठ नसल्याने मुली घरीं शिकतात. दोनचार बायकांना लिहिता वाचतां येतें. ब्रिटिश राज्य होईपर्यंत ह्यांच्यावर कसलाही कर नव्हता. कारण हे बहिष्कृतच होते. आता कर आहेत पण त्याचा उपयोग मात्र त्यांच्या उन्नतीकडे होत नाही. हाच प्रकार हिंदुस्थानांत आहे. ब्रिटीश राज्याचा "घेऊं जाणें परि देऊं ना जाणें " हा भोळेपणा सर्वत्र प्रसिद्धच आहे !

माझ्यासमक्ष फौंजींना भिक्षा शिजलेल्या भाताचीच मिळाली. थडगें खणणें. टेप विणणें, वैद्यकी करणें, शिवाय सर्वसामान्य भिक्षा मागणें इ. यांची हक्काची कामें आहेत. कित्येक घरांची दारें लागलेलीं होती; कारण पुरुष, बायका, मुलें सगळींच भिक्षेस गेलीं होतीं. भिक्षेचे तांदूळ स्वस्त दराने विकून पैसा करितात. मग त्यांनी इतर कबाडकष्ट कां करावेत ? राहणी आमच्याकडील चांभारांपेक्षा पुष्कळ बरी दिसली. तरी पण गांवात घाणेरडेपणा, बागबगीचे, टापटीप यांची मिसळ दिसली. सर्वसाधारण ब्रह्मदेशांत घराभोवती पुष्कळ जागा असतेच. त्यांत कुंड्यांतून गुंफा लावून फुलझाडें आणि भाजीपाला करण्याची चाल चहूकडे आहे. ब्रह्मी लोक ( बहिष्कृतांसह ) फुलांच्या माळांचे मोठे शोकी ! या महारवाड्यासारखीं कांही स्वच्छ आंगणे व फुलांच्या वेलींचे मंडप मला हिंदुस्थानांतील खेड्यांमधून ब्राह्मणांच्या सुद्धा परसांत आढळतील की नाही, याची शंकाच आहे ! तरी पण या खेड्यांत मला कुजलेल्या मांसाची दुर्गधि येतच होती. अशा खेड्यांतून डुकरें कोठेच दिसली नाहीत, पण गावगुंड कुत्री मात्र ब्रह्मदेशांत वतनदार इनामदारांप्रमाणे वावरत आहेत. जेथे जावें तेथे स्वागत आहेच ! नंतर आम्ही खालील ७ घरें बारकाईने पाहिली.


पहिलें घर - वृद्ध मालकीण बैलासाठी सुंभी काढण्या वळीत बसली होती. इतरांप्रमाणे सर्व घर सहा फूट उंच खांबावर बांधिलें होतें. तें सर्व लांकूड व बांबूचें होतें. पक्ष्याच्या घरट्याप्रमाणे शोभत होतें; हवेचा तोटा नव्हता. पुढे पडवी, बाजूस सैपांकाची खोली, नंतर माजघर, त्याचे बाजूस निजावयाची खोली, अशी प्रशस्त सोय होती. प्रत्येक खोली अजमासें १२ x १० फूट लांब रुंद  होती. स्वयंपाकाचीं भांडी मातीचीं, माजघरांत एक मोठा आरसा, भिंतीस पूर्वेकडचे बाजूस पूजेसाठी बुद्धाचें चित्र, निजावयाचे खोलींत मच्छरदाणी असें सामान होतें. भिंती व जमीन बांबूच्या कुडाच्याच होत्या. आई, मुलगा, सून अशीं तीन माणसें. पैकी मुलगा व सून भीक मागावयास गेली होती ! हें मध्यम प्रकारचें घर म्हणावयाचें.


दुसरें घर - मालक तरुण व धडधाकट होता. धंदा भीक मागण्याचा .


तिसरें घर - मालकाचें वय ७३ वर्षे, त्याच्या बायकोचें वय ७७ वर्षे. त्याचा पहिला मुलगा वय ५५, बायको व तीन मुलें. दुसरा वय ५०, बायको व तीन मुलें. तिसरा वय ४०, बायको व दोन मुलें. अशा एकंदर सोळा माणसांचे हें कुटुंब होतें. म्हाता-याचा धंदा वैद्यकीचा. शिवाय भिक्षा ही आहेच. मधला मुलगा दुसरीकडे आपल्या बायकोच्या घरी राहात होता. नवराबायकोशिवाय सर्व माणसें भिक्षेला गेली होतीं. कारण सकाळची भिक्षेची वेळ. चमत्कार हा की, स्वत: भिक्षा मागणा-या बहिष्कृतांचे घरी सर्वांत पूज्य व श्रेष्ठ मानिलेला फौंजी वर्ग सकाळी भिक्षा मागायला येत होता. घराला प्रशस्त व स्वच्छ अंगण होतें. उजव्या बाजूस चांगला लतामंडप व भोंवताली कुंड्यांतू फुलझाडें होती. मंडपांत एक लाकडी मंचक होता. बसावयाची ही आरामवाटिका होती. डाव्या बाजूस स्वतंत्र स्वयंपाकाची जागा होती. हें पहिल्या प्रकारचें घर म्हणावयाचें.


चौथें घर - मालकाचें वय ५२, धंदा वैद्यकीचा, भिक्षा भागत नाही. घर दोन मजली व मजबूत लाकडी होतें. बायकोचें वय ४२ चार मुलें. कोणासही लिहिता वाचतां येत नव्हतें.


पांचवें घर - मुख्य मालकीण नवार विणीत बसली होती. नवरा, बायको व मुलें. राहावयास एकच खोली. हें कनिष्ठ प्रकारचें घर.


सहावें घर - मालक तरुण ताजातवाना. धंदा वैद्यकीचा. बायको व तीन सुंदर मुलें. भिक्षा मागत नाही.


सातवें घर - हे सर्व खेड्यांत सुंदर होय. सागवानी लाकडाचें खालवर बांधिलेलें, वारनीस केलेलें, अगदी पेटीसारखे. पण नवरा बायकोचा धंदा केवळ भिक्षेचा ! भिक्षेला गेल्यामुळे घर बंद होतें. प्रशस्त अंगणही होतें.


एक देवालय होतें, तें गांवक-यांनी स्वत:च्या खर्चाने बांधिलेलें. पुढे सभामंडप होता. गाभा-यात उंच कट्ट्यावर १० लहान मोठ्या बुद्धाच्या मूर्ति होत्या. त्या सर्व सोनेरी वर्खाने मढविलेल्या होत्या. शिवाय दोन मूर्ति संगमरवरी दगडाच्या सुंदर होत्या. चातुर्मात्यानंतर (नवंबरच्या सुमारास ) वार्षिक महोत्सव होतो. त्यावेळी पगान गावांतील सर्व लोक देवास नैवेद्य आणितात. त्यांस मांस, मासे, इ. सर्व प्रकार असतात पण देवळापुढे बळी मारला जात नाही. गांवांत कॉलरादेवी वगैरे आजार झाल्यावर ह्यांतील एक मूर्तीचा छबिना शांतिप्रीत्यर्थ गावांतून मिरविण्यात येतो. येणेंप्रमाणे मरीआईचें काम बुद्धाला आणि महार मांगाचे अधिकार ह्यांना आहेत. हा सर्व हिंदू परिणाम. फौंजी येऊन ह्या लोकांच्या मुलांचे उपनयनविधि ह्या सभामंडपात करितात. ही मुलें फौजीच्या शाळेमध्ये इतरांबरोबर समान दर्जाने राहतात. फौंजीच्या मठात भेदभाव नाही. ह्या लोकांतील भिक्षुणी इतर भिक्षुणींच्या संघांत राहू शकतात. अशी एक भिक्षुणी सध्या आहे.


प्रिन्सिपाल सैन यानी दुभाष्याचें काम उत्तम कौशल्याने व धोरणाने केलें म्हणून ह्या लोकांचा विश्वास आम्हांवर बसला. त्यांनी आपला खरा वृत्तांत सांगितला. एरव्ही उडवाउडवीच केली असती. आम्ही जाऊं तेथे स्त्रीपुरुषांचा घोळका जमत असे. नागडीं, उघडीं, शेंबडी मुलें काखेंत व जात्याच्या खुंट्याएवढा मोठा चिरूट तोडांत धरून धुराचे लोट हवेंत सोडीत बायका भोवतालीं जमत असत. प्रथम ज्यांनी भुंकून हैराण केलें तींच कुत्री तपासणी चालली असतां पायाशी स्वस्थ निजून राहात. जणूं काय भुंकणारे वेगळेच होते !


शेवटी मीं सभामंडपांत मंडळीस बसावयास सांगून ब्राह्मसमाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्यांवर सुमारें १५ मिनिटें व्याख्यान दिलें. तें प्रि सैन यांनी ब्रह्मी भाषेंत समजावून सांगितलें. मंडळीना तें आवडले. असेंच मिशन ब्रह्मदेशांत काढावें. अशी त्यांनी कळकळीची इच्छा दाखविली. प्रि. सैन 'आपण या कामीं मदत करु.' म्हणाले. वेळवाच्या टोपल्यांवर लाख मढवून सुंदर भांडी करण्याच्या सरकारी शाळेचे ते प्रिन्सिपाल आहेत. त्याला लॅकर (लाख) स्कूल (शाळा) असें नांव आहे. पण त्या शाळेंत ह्यांच्या मुलांना घेण्यास मात्र प्रि. सैन तयार नव्हते. कारण यांची शाळा निघून तीन वर्षे झालीं, तरी ती अद्यापि प्रयोगाचे अवस्थेंत आहे. यांची मुलें आल्यास वरिष्ठ वर्गांची मुलें शाळा सोडतील ही त्यांना अद्यापि भीति आहे ! हो सर्व तपासणी व माझें डिप्रेस्ड क्लासेस मिशन प्रि. सैनच्या पत्नीला फार आवडलें. दोन प्रहरीं पत्तें खेळतांना तिने जो पैसा जिंकला होता तो सर्व ह्या कामासाठी ध्या, असें म्हणाली !


निरीक्षण चौथें : न्यॉंऊ-२७ मार्च १९२७ रविवारी सकाळी ९ वाजतां आम्ही न्यॉंऊ पश्चिम येथे पोचलों. श्वेझिंगो पगौडा पाहिला. हा अनिरुद्धाने (इ.स. १०४४-१०७७ ) बांधण्यास सुरुवात केली. याची पूर्ति त्याचा समजला गेलेला मुलगा कॅझिटा ह्या राजाने ( इ.स. १०८४-१११२) केली. अनिरुद्धाने थाटूनचा राजा मनुहा ह्याला युद्धांत जिंकून त्याच्या सगळ्या प्रजेला कैदी करुन पगानला आणिलें. मनुहाने इ. सन. १०५९ त "मनुहाचें देऊळ" म्हणून प्रसिद्ध असलेला पगोडा पगानमध्ये बांधिला. शेवटी त्याला असें मोकळें ठेवणें इष्ट न वाटल्यामुळें, अनिरुद्धानें त्याच्या कुटुंबांतील सर्व माणसें व त्याचे सर्व लहानथोर चाकर व अनुयायी यांना देवळी गुलाम करुन त्यांचा सामाजिक दर्जा अत्यंत क्रूरपणाने अतिशय नीच करुन टाकिला. श्वेझिंगो देवळाची झाडलोट करण्याचे कामावर इतरांप्रमाणे मनुहाची नेमणूक झाली. त्यापूर्वींही देवळी गुलाम होतेच. मात्र मनुहाच्या वंशाला अशा देवळी गुलामांचे 'राज्यपद' देऊन दु:खावर अपमानाचा डाग दिला. अगदी आतापर्यंत श्वेतछत्र, पायात सोन्याचा कलाबतूचा जोडा, घराला सरळ उभा जिना इ. राजचिन्हें मात्र मनुहाच्या वंशजास अद्यापि कायम आहेत. मात्र त्यांना देवाचा नैवेद्य व देव्हा-यावरच्या देणगीशिवाय उपजीविकेचें साधन दुसरें नव्हतें. हें त्यांना पूर्वी मुबलक मिळत असावें. एरव्ही त्यांना अशा लवाजम्याने कसें राहतां येईल?


अशा देवळी नोकरांना फयाझून - देऊळ + नोकर-अशी संज्ञा आहे. तुबायाझा आणि फयाचून हे एकमेकांस महाराष्ट्रातील महारार्मागांप्रमाणे कमी लेखितात. तुबायाझाचें म्हणणें आपण कधी जिंकलेले गुलाम नव्हतों. फयाझुनापैकी मनुहाच्या खानदानी अनुयायांचे म्हणणें तर उघडपणेंच आपण श्रेष्ठ असून कोणतेंही हलकें काम आपण केले नाही. पण ज्याअर्थी ते जिंकलेले गुलाम आहेत, त्याअर्थी कोणी त्यांच्याकडे तिरस्काराशिवाय पाहणार नाहीत. आम्ही ह्या गांवी या लोकांचा राजा म्हणा, पाटील म्हणा, जो होता, त्यांची भेट घेतली. त्याचें नांव उ बा ल्वीन ( Ubalwin) वय २७. हल्ली हा आपल्या बायकोच्या घरी राहतो. तिचा बाप खाऊन पिऊन सुखी व स्वत: रबाबदार दिसला. बायकोच्या माहेरचें मध्यम प्रकारचें दुकान व तिच्या बापाचा वैद्यकीचा धंदा आहे. घर दोन मजली व भोवताली स्वच्छ आंगण, लतामंडप, भोंवतालीं कुंड्यांतन फुले दिसली. उ बा ल्वीन आता फायाझुन गांवचा राजा अथवा थजी ऊर्फ पाटील झाला आहे. ह्यांनी सरकारी रजिष्टर काढून दाखविलें. त्यावरुन ह्या फायाझून वाडींत ५०९ घरें आहेत, असें आढळलें. लोकसंख्या सुमारे २००० असावी. ह्या गावासाठी एक सरकारी प्राथमिक मोफत शाळा आहे. पण ह्या लोकांवरचा बहिष्कार पूर्वीप्रमाणे आता कडक नाही. ह्यांच्या विहिरींतील पाणी वरचे वर्ग खुशाल पितात. उघड रोटी बेटी व बेटी व्यवहार मात्र अद्यापि होत नाहीत. ह्यांच्यापैकी बरेच लोक दुसरीकडे खाऊन पिऊन सुखी आहेत, व ते बिनबोभाट वरच्या वर्गांत मिसळून जातात.


पक्कोक म्हणून एक जिल्ह्याचा गाव आहे, तेथे एक गृहस्थ ४० ते ५० हजाराचे मालक आहेत. ते म्युनिसिपालिटीचे सभासद आहेत, घऱीं स्वत:च्या मोटारी आहेत, लाखेची भांडी व इतर बरेच धंदे करितात. तुबायाझाप्रमाणे थडगीं खणणें व भिक्षा मागणें हें ते करीत नाहीत. मात्र देवळाचे दारांतून फुलें, मेणबत्या, उदकाड्या, पंखे वगैरे विकणा-या दुकानांची जी रांग असते, ती ह्याच लोकांची. नंतर आम्हाला उ बा ल्वीन यांनी पगानचे रस्त्याचे पश्चिम बाजूकडील वाडींत असलेला आपला वंशपरपरागत खास राजवाडा दाखविला. हा खरोखरच आमच्याकडील खेड्यांतील एखाद्या श्रीमंत पाटलास शोभण्यासारखा आहे. वाड्याच्या नैऋत्य कोप-याला लागून एक लाकडी मनोरा दिसला. तो सर्व घरापेक्षा उंच होता. ह्यावर रखवालदार बसून रात्रीं पहारा करण्याची ही जागा. वाडा इतर घरांप्रमाणे खांबाच्या एक मजल्यावर उभा केला होता. सर्व घर एकच मजली पण भक्कम व रुबाबदार दिसलें. पूर्वी ह्याला दोन जिने (एक समोर व दुसरा आडवळणाचा भिंतीला समांतर असा) होते. समोरचा जिना पडल्यामुळे आता दिसला नाही. ह्या समोरच्या जिन्याच्या पाय-या चढण्यास मात्र देशाच्या बादशहाशिवाय इतरांला अधिकार नसे. सफाईदार सागवानी लाकडाचें सर्व काम होतें. खिडक्यांना व्हिशिअन शटर्स ( झडपें) होती. दरवाजे विशेष सफाईदार दिसले. दिवाणखाना, निजण्याच्या खोल्या, स्वंयपाक घर ही सर्व ऐसपैस, उंच व रुंद होती. एक मोठा रुंद लाकडी पलंग व त्यावर सुंदर मच्छरदाणी होती. घरांतील चट्याही खानदानी थाटाच्या होत्या. एकंदरीत थाट मोडकळीस आलेल्या इनामदारीचा दिसला. हें पाहून वाईट वाटलें.


उ बा ल्वीन पाटलाची आई ६० वर्षांची वृद्ध आहे. तरी तिचें वय दिसण्यांत सुमारें ५० वर्षांचे दिसले. चेहरा शांत प्रसन्न खानदानाची दिसला. तिचे सर्व दांत स्वच्छ, बळकट, डोळे मोठे व पाणीदार दिसले. हिचा नवरा उ नान पाटील वारून आता १८ वर्षे झालीं, असें तिने सांगितले. त्याच्यामागें तिच्या दोन मुलांला पाटिलकीची वस्त्रें मिळालीं. तेही वारल्यामुळें सर्वांत लहान मुलगा उ बा ल्वीनला आता पाटिलकी मिळाली आहे. मी हिंदुस्थानांतील एक उदार ( ब्राह्म ) धर्माचा प्रचारक, विशेषत: निकृष्ट वर्गाचा एक सेवक आहें, असें तिला सांगण्यांत आलें होतें, त्यामुळे ह्या देशांतील फौंजीपुढे जमिनीवर लवून त्रिवार नमस्कार करितात, तसा तिने मलाही नमस्कार केला. आमचें संभाषण चाललें असतां तिने माझें काम व हृद्गत लवकर ताडलें. त्यामुळें तिचे पाणीदार डोळे दाबून ठेविलेल्या विरळ अश्रूनें स्निग्ध झालेले दिसू लागले. शेवटीं सरकारला सांगून कांही तरी आपली दाद लावा, अशी स्पष्ट विनंती केल्यावाचून तिला राहवेना. हें माझ्या हातून या धांवत्या सफरींत व उतार वयांत कसें व्हावें, हे आठवून मीही किंचित् गडबडलों. मी केवळ मन:पूर्वक आशीर्वाद देऊन माझें समाधान करुन घेतलें.


दक्षिण ब्रह्मदेशांत मोलमेनच्या उत्तर किना-यालगत थटून हें शहर इतिहासप्रसिद्ध आहे. ह्या स्थानी दक्षिणेकडील सिंहली हीनयान बुद्ध धर्मांची पहिली उठावणी झाली. येथे कांची येथूनही बुद्ध धर्माची लाट आली. येथील राजे आंध्र वंशांतील हिंदी क्षत्रिय कुळांतील असून तेलंग ह्या नांवाने एक हजार वर्षांपूर्वी त्यांचा दबदबा सा-या ब्रह्मदेशांत होता. पण इ.स. १०५० चे सुमारास पगानचा ब्रम्ही राजा अनिरुद्ध याने थटून राज्यावरुन सफाई नांगर फिरवून ह्या क्षत्रियांना आता अत्यंत हीन बनविलेलें प्रत्यक्ष पाहण्याची पाळी माझ्यावर आली! इतिहासाची पुनरावृत्ति चहूकडेच होते. आमच्या देशांत ज्या आज महार, मांग, पारिया, चिरुमा, नामशूद्र इ. अनेक नांवांच्या जाती आहेत, त्यांनीही एकेकाळी राज्यवैभव भोगिलें, असें माझ्या संशोधनांत आढळले आहे. पण इतका अलीकडचा उघड पुरावा मला आजवर मिळाला नव्हता; त्यामुळे मला संशोधनाच्या दृष्टीने आनंद होत होता, किंवा मानवी स्वभावांतील आनुवंशिक विषारीपणाचा मासला प्रत्यक्ष पाहून दु:ख होत होतें, हें उघड सांगण्यांत कांही तात्पर्य नाही. मी करीत आहें, हें कार्य पवित्र आहे, येवढेंच मला पुरें आहे.


निरीक्षण पांचवे - शुक्रवार ता. १ एप्रिल १९२७ रोजी सायंकाळी प्रोम येथील श्वेमानडो ह्या मुख्य पगोडाच्या बाजूस असलेला तुबायाझाचा गाव पाहिला. गाव गरीब लोकांचा दिसला. गाव दाखवावयास एक इंग्रजी जाणणारे ब्रह्मी गृहस्थ बरोबर होते; परंतु ह्या खेड्यांत शिरून चौकशी करण्याचें त्यांना धैर्य झालें नाही. एकाद्याची खासगी चौकशी करण्याची ब्रह्मी लोकांस फार भीड व भीति वाटते, असें दिसते. मोलमेनमध्ये मला हाच अनुभव आला. ह्या गृहस्थांनी मला मुकाट्याने गावापासून दूर नेले. मला ब्रह्मी येत नसल्याने स्वत: चौकशी करिता आली नाही व हे गृहस्थ तर फारच भित्रे दिसले. माझी खडकर निराशा  झाली. तेव्हा मी जवळच्या पगोड्यांत गेलो. तेथे एका वृद्ध गृहस्थाजवळ थोडी चौकशी केली. 'हे तुबायाझा आहेत' ह्यापलीकडे हे गृहस्थ कांही सांगू शकले नाहीत. आटपलें.

 
येणेंप्रमाणे ब्रह्मदेशांतील मूळ बहिष्कृत वर्गांची हल्लीची स्थिती आहे. हिंदुस्थानांतून अलीकडे गेलेले अस्पृश्य जातींचे लोक ब्रह्मदेशांत ठिकठिकाणी पोटासाठी अनेक हलकीं सलकीं व काबाडकष्टाची कामे करुन पुष्कळ आहेत. पण ते बहिष्कृत नाहीत.