मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केल्यानंतर अस्पृश्यतानिवारणकार्यास वेगाने चालना देण्याच्या दृष्टीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू केले. अस्पृश्यता नष्ट करण्याचा आणि अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याचा प्रश्न अखिल भारतीय पातळीवरी महत्त्वाचा प्रश्न आहे, हे ध्यानात घेऊन महाराष्ट्रात त्याचप्रमाणे अन्य प्रांतांतही ह्या कार्याचा प्रचार करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजना आखली. ह्या कामाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या वेळेस अस्पृश्यतानिवारक परिषदेचे अधिवेशनही डिसेंबर १९०७च्या सुरत येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनापासून सुरू केले. त्यांच्या ह्या धोरणामुळे देशभरातील नेत्यांना अस्पृश्यतानिवारणकार्याची निकड जाणून देण्याचे कार्य घडू लागले. त्यांनी आयोजित केलेल्या ह्या परिषदांचे आरंभीचे अध्यक्ष सत्येंद्रनाथ टागोर (सुरत, १९०७), रावबहादूर मुधोळकर (बांकीपूर, १९०८), गोपाळ कृष्ण गोखले (मद्रास, १९१०), लाला लजपतराय (कराची, १९१२), सयाजीराव गायकवाड (मुंबई, १९१८), म. गांधी (नागपूर, १९२०) ह्यांसारख्या मान्यवर व्यक्ती होत्या. शिंदे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळेच लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. अँनी बेझंट, म. गांधी इत्यादी अखिल भारतीय पातळीवरील नेत्यांचे लक्ष ह्या कामाकडे आकृष्ट करून घेऊन त्यांची सहानुभूती संपादन करता आली.

मिशनच्या स्थापनेनंतर अगदी दोन-तीन अस्पृश्यांच्या प्रश्नाबाबत वेगाने लोकमत जागृत होऊ लागले. ह्या कामाबद्दल योग्य अशा प्रकारचा दृष्टिकोण निर्माण होऊ लागला, याचा पडताळा मिळू लागला. अस्पृश्य मानलेल्या जातीच्या उन्नतीसंबंधी लाला लजपतराय यांनी त्यांच्या पंजाबी पत्राच्या ६ मे १९०९च्या अंकात एक लेख लिहिला व या लोकांना सांप्रत अन्यायाने व निदर्यपणे वागविण्यात येते हे गैर असून देशाचा एक भाग लंगडा-पांगळा ठेवणे हे देशोन्नतीस विघातक असल्याचे बजावले. अस्पृश्यता टिकवून ठेवणे हे राजकीयदृष्ट्या तर हानिकारक आहेच. परंतु राष्ट्र या नात्याने आपला सुरक्षितपणा अस्पृश्यतेच्या प्रश्नावर अवलंबून आहे;  राष्ट्राची प्रगती खालपासून वरपर्यंत झाली पाहिजे असे प्रतिपादन करून किरकोळ राजकीय फायद्यापेक्षा राष्ट्रउभारणीच्या दृष्टीने अस्पृश्यता नाहीशी करणे निकडीचे आहे, असे लाला लजपराय यांनी प्रतिपादन केले. अखिल भारतीय पातळीवर नेत्यांची भूमिका कोणत्या प्रकारची बनत चालली होती, याची कल्पना लजपतराय यांच्या लेखातून प्रकट होते.१ ऑक्टोबर १९०९च्या तिस-या आठवड्यात मुंबई येथे टाऊन हॉलमध्ये अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ह्या सभेमध्ये न्या. चंगावरकर, ना. गोखले यांची भाषणे झाली. दोघांनीही आपल्या भाषणात अंत्यजांचा मानलेला अस्पृश्यपणा हीच अस्पृश्याविषयक प्रश्नाबाबत जाचक बाब आहे, असे सांगून अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उदार धर्मतत्त्वाचा आधार घेतला पाहिजे असे या भाषणात प्रतिपादन केले. ही गोष्टही विशेष महत्त्वाची म्हटली पाहिजे, कारण ना. गोखले आपली भूमिका सामान्यतः धर्मनिरपेक्ष भूमिकेवरून मांडीत असत, ते म्हणाले, “….त्यांचा समाजातील दर्जा वाढवून, त्यांस शिक्षण देऊन त्यांच्या भौतिक उन्नतीची तजवीज झाली म्हणजे संस्कृत झालेल्या बुद्धीस योग्य अशी उदार धर्मतत्त्वे त्यांस शिकविली पाहिजेत आणि अशी तत्त्वे प्रार्थनासमाजाच्या धर्मात आहेत.” मिशनच्या कार्याला साहाय्य करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “हा उत्कट देशप्रीतीचा व उदार मनेवृत्तीचा प्रश्न आहे. आपल्या मायभूमीवर ज्याचे खरे प्रेम असेल व सर्वत्र न्याय व्हावा, अशी इच्छा असण्याइतकी ज्यांची उदारबुद्धी असेल, त्यांस या कामी होईल तेवढे साहाय्य करावे असे वाटल्यावाचून राहणार नाही आणि तेस वाटणा-या प्रत्येक मनुष्यास थोडेबहुत साहाय्य करता येईल. रा. शिंदे यांच्या गरजा पुष्कळ व नानाप्रकारच्या आहेत. या कामी आपले सर्व आयुष्य वेचणारे असे प्रथम आस्थेवाईक मिशनरी मिळाले पाहिजेत. नंतर समाजाकडून पैशाची चांगली मदत व्हावयास पाहिजे.... माझे स्वतःचे मत असे आहे की, आपल्या समाजाच्या विवेकबद्धीस खरोखरीच चेतना मिळाली आहे. पूर्वीची रात्र संपून नवीन अरुणोदयाची प्रथमची छटा आपणास दिसावयास लागली आहे.”२ ना. गोखले यांना प्रस्तुत भाषणात मिशनच्या कार्याला साहाय्य करावे असे कळकळीचे आवाहन केले. मिशनने सुरू केलेले कार्या शिंदे यांचेच कार्य होय असे त्यांनी ओघाने नमूद केले. अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी जे साहाय्य आरंभापासून केले आहे त्याबद्दलही त्यांना धन्यवाद दिले. लाला लजपतराय, ना. गोखले, अँनी बेझंट, श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्या नेत्यांचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणकार्याच्या संदर्भात यशस्वीपणे साहाय्य मिळविले.

अस्पृश्यतानिवारणकार्याबद्दल सरकारचे-पर्यायाने सरकारी अधिका-यांचेही-साहाय्य व सहानुभूती मिळणे शिंदे यांना महत्त्वाचे वाटत होते. इंग्रज अधिका-यांचे साहाय्य मिळाल्याचा परिणाम समाजातील उच्च स्तरांवरील लोकस अधिकारीवर्ग तसेच संस्थानिक यांवर मोठ्या प्रमाणावर पडू शकतो हे शिंदे यांनी अजमावले होते. सरकारी पातळीवरून ह्याबाबतीत प्रयत्न करावयाचा झाल्यास कलेक्टर, कमिशनर ह्यांसारख्या वरिष्ठ इंग्रज अधिका-यांची सहानुभूती असणे उपयोगाचे ठरणार होते, स्वतः शिंदे यांनी इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेतले होते. ख्रिश्चन धर्माची उदार शिकवण कशी आहे, हेही त्यांना माहीत होते. ख्रिश्चन धर्मातील उदार मानवतावादी संस्कारामुळे इंग्रज अधिका-यांची अस्पृश्यताविषयक प्रश्नाला सहानुभूती मिळविणे शिंदे यांना शक्य होत असे. मिशनरी म्हणून शिंदे यांच्याबद्दल इंग्रज अधिका-यांना आदरबुद्धी वाटणे स्वाभाविक होते. शिंदे यांनी ह्या कामाचा प्रसार करताना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन इंग्रज कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रतिष्ठित मंडळींची कमिटी ह्या कामासाठी स्थापन करण्याची पद्धती सुरू केली. केवळ कलेक्टरच्याच पातळीवर नव्हे, तर गर्व्हनरशीसुद्धा शिंदे यांनी ह्या कामासाठी संबंध स्थापित केले व सर जॉर्ज क्लार्क यांसारख्या गव्हर्नरची ह्या कामी सहानुभूती संपादन केली. सर क्लार्क यांनी ह्या कामाचे महत्त्व ओळखून आपल्या कन्येला मिशनला आर्थिक साहाय्य करता यावे यासाठी गाण्याचा जलसा आयोजित करण्याला परवानगी दिली, हा भाग आपण पाहिलेला आहेच.

मिशनच्या वेगवेगळ्या शाखांना कलेक्टर, इंग्रज अधिकारी हे भेट देऊन साहाय्य करीत व उत्तेजन देत. इगतपुरी येथील मिशनच्या शाळेला १ मे १९०९ रोजी नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन यांनी भेट दिली. गणेश आकाजी गवई यांनी शाळेबद्दलची माहिती इंग्रजीमध्ये भाषण करून सांगितली. कलेक्टर मि. जॅक्सन यांनी सरकारकडून शाळेला मदत मिळेल असे आश्वासन देऊन शाळेच्या खर्चासाठी दहा रुपये देणगी दिली.३ मुंबई येथे २४ मे १९०९ रोजी प्रो. देवल यांनी आपल्या सर्कशीच्या एका दिवशीच्या प्रयोगाचे उत्पन्न मिशनला देण्याचे मान्य केले. पोलीस कमिशनर मि. एडवर्डस् व सर भालचंद हे प्रयोगाच्या वेळी उपस्थित राहिले. दापोली येथील मिशनच्या शाळेला फेब्रुवारी १९०९ मध्ये दक्षिण भाग कमिशनर मि. एस. सी. गिब यांनी सपत्नीक भेट दिली व संस्थेला दहा रुपयांची देणगी दिली. कलेक्टर ए. एफ. मेकॉनिकी यांनीही या शाळेस भेट देऊन रुपयांची देणगी देऊन आपली सहानुभूती प्रकट केली.४ धारवाड येथेही कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थानिक प्रतिष्ठितांची कमिटी स्थापन केली.

मिशनच्या कार्याला प्रारंभ झाल्यानंतर सामाजिक सुधारणेला अनुकूल असणा-या उदारमनस्क स्त्री-पुरुषांची सहानुभूती ह्या कामी प्रकट होऊ लागली. पुण्यास प्रारंभिक काळातच कॅम्पामध्ये दिवसाची शाळा, कॅम्पातील मोफत वाचनालय, गंजपेठ व मंगळवार पेठ येथील रात्रशाळा ह्या मिशनच्या वतीने सुरू झाल्या होत्या. १९०९ सालीच कॅम्पातील दिवसाच्या शाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या १२७ झाली. ह्या सर्वंच शाळांमधून होणा-या उपक्रमांना शहरातील प्रतिष्ठित स्त्री-पुरुष उपस्थित राहत असत व समयोचि स्वरूपाची भाषणे करीत असत. अशा प्रतिष्ठित व्यक्तिंमध्ये रा. ब. का. बा. मराठे, श्रीमती रमाबाई रानडे, प्रो. धोंडो केशव कर्वे, प्रिन्सिपॉल परांजपे, प्रो. केशवराव कानिटकर, प्रो. वा. ब. पटवर्धन इत्यादी मंडळींचा समावेश होतो. ह्या मंडळींनी भेटी दिल्या व देणग्यांच्या रूपाने अर्थसाहाय्य दिले. मुलांसमोर उपदेशपर भाषणे केली. १९०९च्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, या तीन महिन्यांतच मिशनला सहाशे साडेअठ्ठावन रुपये आर्थिक साहाय्य म्हणून मिळाले. पुणे शहर हे तर परंपरानिष्ठांचे मुख्य ठाणेच. वर नमूद केलेल्या उदारमनस्क व्यक्तींनी मिशनला साहाय्य करणे हे स्वाभाविकच होते. परंतु परंपनिष्ठ समजल्या जाणा-या व्यक्तीही आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून अस्पृश्यवर्गीयांशी प्रेमाने व बरोबरीच्या नात्याने वागू लागले, असे चित्रही दिसू लागले होते. ८ ऑगस्ट १९०९च्या सुबोधपत्रिकेत ‘भारतपुत्र’ या टोपणनावाने लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये रा. किसन फागुजी बनसोडे पाटील व रा. गणेश आकाजी गवई हे पुणे येथे आले, तेव्हा केसरी ऑफिस, भालाकार व मुमुक्षूकार रा. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांची घरी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी स्पर्शास्पर्शाचे भेद न दाखविता इतर हिंदूंप्रमाणे व प्रेमाने वागविले असे कळते. २८ जुलै १९०९ रोजी रा. नरसिंह चिंतामण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात ‘अंत्यज जातीची उन्नती’ या विषयावर रा. बनसोडे व रा. गवई यांची भाषणे झाली. या प्रसंगी अध्यक्ष केळकर यांनी हिंदूंनी तुम्हा लोकांना अस्पृश व नीच मानले ते योग्य नाही अशा आशयाचे भाषण केले व भालाकार भोपटकरांनी अध्यक्षांचे आभार मानले.५

पुण्यातील ल. रा. पांगारकर यांच्यासारख्या कर्मठ, सनातनी गृहस्थाच्या वृत्तीतही बदल झाला ही स्पृहणीय गोष्ट म्हणावी लागेल. ल. रा. पांगारकर यांच्या १८९७च्या रोजनिशीतील एक नोंद खालीलप्रमाणे आहे. “तारीख २७/२/९७. मातोश्री आईस सडकून ताप आल्याकारणाने मोठ्या हिकमतीने तांग्यात घालून बसती केल्यासारखे करून तांगा भऱदिवशी पुण्याबाहेर हाकलला. तांगेवाल्याला ५ रु. बक्षीस दिले. रँडची धामधूम चालू. लोक भयभीत झालेले. महार-मांगांचे हात आईच्या देहाला आता लागणार नाहीत असे वाटून अत्यंत समाधान झाले. आईला सुखरूप घेऊन पौडास आलो.”६ अशा प्रकारची कर्मठ मनोवृत्ती असणा-या पांगारकरांच्या मनोभूमिकेत झालेल्या एवढा बदल अत्यंत स्पृहणीय म्हणावा लागेल.

अस्पृश्यतानिवारणकार्याच्या जोडीनेच आनुंषागिक स्वरूपाच्या दुस-या एका कामाला शिंदे यांनी आरंभ केला होता. हे कार्या म्हणजे मुरळी सोडण्याच्या प्रथेला प्रतिबंध बसावा, यासाठी सरकारचे साहाय्य घेऊन स्थापन केलेली ‘पश्चिम हिंदुस्थानातील मुलांचे रक्षण करणारी संस्था.’ ह्या संस्थेचे उद्देश व कार्य लक्षात घेऊन ह्या अनीतिमूलक प्रथेच्या विरुद्ध सरकारने कायदाही केला. शिंदे यांनी १९०७ साली सुरू केलेल्या या चळवळीस चांगले यश मिळत चालले. मुरळी सोडलेल्या मुलींना समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळावे यासाठी अशा मुलींची लग्ने लावून समाजात पुनःस्थापित करण्याच्या दृष्टीनेही शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ केला होता. १८ एप्रिल १९०९ रोजी खडकी येथे गणपतराव हणमंतराव गायकवाड या सधन तरुणाचा शिवूबाई या नावाच्या मुरळीबरोबर विवाह लावण्यात विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. अस्पृश्य समाजातील विविध जातींतील मुली प्रधान्याने मुरळी म्हणून या देवाला वाहिल्या जात असत, म्हणून विविध अस्पृश्य समाजातील विविध जातींतील मुली प्राधान्याने मुरळी म्हणून या देवाला वाहिल्या जात असत, म्हणून विविध अस्पृश्य जातींतील लोकांचे या प्रथेविरुद्ध लोकमत संघटित करणे व मुरळी सोडलेल्या मुलींची लग्ने लावून समाजात त्यांना पुन्हा प्रतिष्ठेचे जीवन जगण्यास मदत करणे हे विठ्ठल रामजी शिंदे यांना आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने अस्पृश्यवर्गीयांचे लोकमत जागृत करण्याचा प्रयत्नही केला जात होता. ५ जून १९०९ रोजी कोल्हापूर येथे ‘मिस् व्हायोलेट क्लार्क निराश्रित वसतिगृहा’च्या आवारात विठ्ठल रामजी शिंदे यांचे गोविंदराव सासने यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान झाले. ह्या सभेत सर्वानुमते पुढील ठराव मंजूर करण्यात आला. “ता. १८/४/१९०९ रोजी खकडी येथे रा. रा. गणपतराव गायकवाड यांचा शिवूबाई नावाच्या मुरळीबरोबर जो विवाह झाला तो कोल्हापूच्या अस्पृश्य मानलेल्या म्हणजे   महार, मांग, ढोर, चांभार वगैरे जातींच्या लोकांस पसंत असून त्यांची संमती आहे.” हा ठराव चोख नरसिंग महार यांनी मांडला व सखाराम राणेजी मांग यांनी त्यास अनुमोदन दिले. पुष्टी देणा-यांत चांभार व अन्य जातींचे लोकही होते. या सभेबद्दलची माहिती गणपत कृष्णाजी कदम यांनी पत्र लिहून सुबोधपत्रिकेतून प्रसिद्ध केली.७

महार जातीचे पुढारी श्री. शिवराम जानबा कांबले यांनीही या प्रश्नामध्ये गंभीरपणे लक्ष घातले. जेजुरी येथे खंडोबाच्या देवळात दरवर्षी जत्रेच्या वेळी मुरळी सोडण्यात येत असत. ह्या प्रथेविरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठी कांबळे यांनी १९०९ साली जेजुरी येथे महार लोकांची एक मोठी परिषद भरवून लोकांनी आपल्या मुरळ्या करू नयेत आणि जे लोक मुरळ्यांबरोबर लग्न करण्यास प्रवृत्त होतील त्यांना जातीकडून अडथळा होऊ नये असा सर्व गावच्या महारांकडून ठराव पास केला. मुरळी प्रथेविरुद्ध जे लोकमत जागृत होत होते, त्याचा परिणाम जेजुरी येथील खंडोबाच्या यात्रेच्या वेळी पास केला. वर्षीच दिसून आला. त्या वर्षी एकही मुरळी सोडण्यात आली नाही.८ मात्र अशी प्रथा बंद करण्याच्या सुधारणेला निरपवादपणे सार्वत्रिक मान्यता मिळणे ही गोष्टही कठीणच होती. शिवबाई या मुरळीचे लग्न गणतपराव गायकवाड यांच्याशी लावण्यात आल्याने येसूबीन काशीराम बटलर महार गोसावी हा गृहस्थ संतप्त झाला. गायकवाडांच्या घरी तो गेला. शिवुबाईला ओढून त्याने रस्त्यावर आणले व गायकवाड बायकोला सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली. येसूबीन काशीरामवर गुन्हा शाबीत होऊन खडकी कँटोंबन्मेंट मॅजिस्ट्रटने त्याला दीड महिना सक्तमजुरीची शिक्षा दिली ही गोष्ट अलाहिदा.९

पारंपरिक रूढीच्या विरोधात केलेल्या सुधारणांविरुद्ध येसबीन काशीरामसारखे केवळ अस्पृश्यवर्गातच पुरुष होते असे नव्हे. शिंदे यांनी सुरू केलेल्या अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीस सुशिक्षितवर्गातून व विशेषतः ब्राह्मणवर्गातून पाठिंबा मिळत असला तरी अस्पृश्यवर्गाबद्दल पारंपारिक तुच्छतेची भावना टिकवून धरणारे प्रतिगामी वृत्तीचे लोक समाजामध्ये होते. सातारा येथे निराश्रितांच्या उन्नतीसंबंधात रा. सीतारामपंत जव्हेरे यांनी कळकळीने कार्य सुरू केले होते. अस्पृश्यवर्गीयांच्या उन्नतीचा विचार करण्यासाठी नोव्हेंबर १९०९ मध्ये भरलेल्या एका सभेत लो. टिळकांचे सहकारी, सुप्रसिद्ध पुढारी श्री. दादासाहेब करंदीकर यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणातून ब्राह्मण्याबद्दलचा अहंकार व अस्पृश्यवर्गीयांबद्दलचा तुच्छताभाव तीव्रपणे प्रकट होत होता. ते म्हणाले, “आम्ही जातीने ब्राह्मण, आम्ही श्रेष्ठ, तेव्हा आम्ही ब्राह्मण तुम्हाला (निराश्रितांना) मिठ्या मारू लागू असे काही होणे नाही. तुम्हाला शिकविणे, तुमच्या उन्नतीचा खल करणे हे ठीक आहे. आणखी असे की, रा. जव्हेरे हे बोलूनचालून पडले ब्राह्मणेतर. त्यांची जात सोनार आहे, हे तुम्हाला माहीत नसल्यास सांगून ठेवतो. त्यांच्यासारख्यांनी तुमच्या संबंधाने स्पर्शास्पर्शाचा भेद राखला नाही, तर त्यांची गोष्ट निराळी व आम्हा ब्राह्मणांची गोष्ट निराळी.”१०

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक चळवळीसंबंधी धूर्तपणाने गैरसमज होईल अशा प्रकारची कृतीही काही परंपरानिष्ठ मंडळी करीत होती असे दिसते. १९१० साली खुद्द पुणे शहरातच अस्पृश्यतानिवारणकार्याचा पुष्कळ बोलबाला होऊ लागला होता. १९०५ सालीच विठ्ठल रामजी शिंदे यांच्या रीतसर शाखा पुण्यास स्थापन झाली व श्री. ए. के. मुदलियार ह्यांच्या कळकळीच्या प्रयत्नामुळे पुण्यातील कामाला जोराची चालना मिळाली. १९०९ साली श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मिशनचा बक्षीस समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. प्रो. धोंडो केशव कर्वे, प्रो. वा. ब. पटवर्धन, रँ. र. पु. परांजपे वगैरेंसारखा प्रतिष्ठित मंडळींनी अस्पृश्यतानिवारण चळवळीला जोरदार व सक्रिय पाठिंबा देण्यास सुरुवात केली. अशा त-हेने अस्पृश्यतानिवारणकार्याचा प्रभाव पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात पडला होता. त्याची दखल न घेणे हे परंपरानिष्ठांनाही अशक्य होऊन बसले. परंतु मनातून ही चळवळ नापसंत असलेले लोक ह्या चळवळीबद्दल समाजमनाचा प्रतिकूल ग्रह व्हावा अशाप्रकारे धूर्तपणाचे वर्तन करीत होते, असे दिसते. ज्ञानप्रकाशने लिहिलेल्या स्फुटामध्ये वक्तृत्वोत्तेजक सभेने ह्या संबंधात जो एक विषय दिला आहे, त्याचा समाचार घेतला आहे. स्फुटात म्हटलेले आहे की, “यंदाच्या पुण्याच्या वक्तृत्वोत्तेजक सभेमध्ये निराश्रितासंबंधीचा एक विषय आहे, पण त्याची योजना करताना पुणेकरांची सावधगिरी व धूर्तता प्रत्यक्षपणे अनुभवास येते. पुढली वाक्ये पहा. “निष्कृष्ट जाती असे ज्यास वक्तृत्वोत्तेजक सभेमध्ये म्हटले त्यांच्याशी एकदम व्यवहार सुरू करा असा आज कोणाचा आग्रह आहे? असे कोणी प्रतिपादिले आहे? असे जर कोणी प्रतिपादित नाही, तर लोकांना घाबरविण्यात हशील ते काय? दुसरे असे की, ठिकठिकाणच्या वरिष्ठ जातींमधील बरीच सुशिक्षित मंडळी आज ह्म चळवळीस आपली सहानुभूती दाखवीत आहेत. निदान प्रस्तुत चळवळीचे आपण हितचिंतक नाहीत असे तरी म्हणवीत नाहीत. अशी वेळी ह्म उद्धाराच्या चळवळीचा दुरुपयोग होण्याचा संभव आहे, असा एकदा लोकांचा खरा-खोटा समज झाला की, तो टाळण्याचा उपाय कोणी करत बसणार नाही. ह्या सावधगिरीने चालत्या गाड्यास अनायासे खीळ बसणार आहे आणि दुदैवाने असा जर परिणान झाला तर त्याचे सर्व श्रेय पुणेकरांस बिनबोभाट मिळणार आहे.”११

अस्पृश्यतानिवारणकार्यास सुशिक्षितवर्गाचा पुणे-सातारा यांसारख्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असला तरी ह्या चवळवळीबद्दल अहंकारबुद्धीने उघडपणे नापसंती प्रकट करणारे दादासाहेब करंदकरांसारखे प्रतिष्ठित लोकही समाजात होते, तर ह्या चळवळीबद्दल गैरसमज उत्पन्न होऊन तिच्या कार्याला खीळ बसेल अशा प्रकारची कारवाई छुपेपणाने करणारी वक्तृत्वोत्तेजक सभेतील बुद्धिमंत होते. समाधानाची गोष्ट एवढीच की, ह्या कार्यास उघडपणे वा छुपेपणाने विरोध करणा-या मंडळींची संख्या मात्र सुदैवाने अल्प प्रमाणात होती. एकंदरीत भारतीय निराश्रित मंडळीने आपल्या कार्याला आरंभ केल्यापासून तीन-चार वर्षांतच सांस्कृतिक वातावरण फार मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले. अस्पृश्यतानिवारणासंबंधीच्या विचाराला, अस्पृश्यवर्गीयांच्यात शिक्षणप्रसार वाढविण्याच्या कार्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली व अस्पृश्यवर्गीयांबद्दलच्या आत्मीयतेच्या भावनेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, १६ मे १९०९.
२.    तत्रैव, २४ ऑक्टोबर १९०९.
३.    तत्रैव, १६ मे १९०९.
४.    तत्रैव, २३ मे १९०९.
५.    तत्रैव, ८ ऑगस्ट १९०९.
६.    ल. रा. पांगारकर, चरित्रचंद्र, नाशिक, १९३८, पृ. ९६.
७.    सुबोधपत्रिका, १३ जून १९०९.
८.    ज्ञानप्रकाश, ५ मे १९१०.
९.    तत्रैव.
१०.    सुबोधपत्रिका, १४ नोव्हेंबर १९०९.
११.    ज्ञानप्रकाश, २७ एप्रिल १९१०.