1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

कार्याची सुरुवात

निराश्रित सेवासदन  :  अशा रीतीनें एक वर्ष लोटल्यावर निराश्रित साह्यकारी मंडळीचे कामाचा चहूंकडे बोलबाला होऊं लागला.  या नवीन कार्याबद्दल अनुकूलप्रतिकूल मतें प्रकट करण्यांत वृत्तपत्रकारांची चढाओढ लागली.  या राष्ट्रीय मुहूर्तकालांत मुंबईस बिनबोभाट परोपकारी कृत्यें करणारे दोन दानशूर गृहस्थ होते.  एक मलबारी नांवाचे पारशी गृहस्थ व दुसरे दयाराम गिडुमल, सुरतेचे डिस्ट्रिक्ट जज्ज.  पुण्याचे प्रो. धोंडोपंत कर्वे - अनाथ महिलाश्रमाचे संस्थापक, प्रो. गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवकमंडळाचे संस्थापक, राजकारणांत सारा हिंदुस्थान हलवून सोडणारे टिळक वगैरेंनीं महाराष्ट्राला तत्कालीन अग्रपद मिळवून दिलें होतें.  अशा मुहूर्तकाळीं वरील दोन परोपकारी गृहस्थांना केवळ महिलांच्या उद्धारासाठीं निष्काम बुद्धीनें कांहीं तरी करावें ही तळमळ लागून राहिली होती.

एके दिवशीं दयाराम गिडुमल या थोर पुरुषाकडून मीं त्यांना समक्ष भेटून जावें अशी अत्यंत प्रेमळपणाची चिठ्ठी आली.  ती भेट मी कधीं विसरणार नाहीं त्यांनीं मला अत्यंत आपलेपणानें कवटाळून, डोळ्यांत आंसवें आणून विचारलें.  ''हें अपूर्व मिशन काढण्याची कल्पना तुम्हांला कशी सुचली ?  ह्या कामीं अस्पृश्यवर्गांतल्या महिलांसाठीं तुम्हीं कांहीं तजवीज केली आहे काय ?''  मी निर्भीडपणें सांगितलें, ''ह्या हतभागी भारतामध्यें पुरुषांपेक्षां महिलांची स्थिति अत्यंत दुर्बल व केविलवाणी आहे, हें मी जाणून आहें.  माझ्याप्रमाणेंच माझ्या घरांतल्या मंडळींनाही ही जाणीव असल्यानें माझी त्यागी बहीण आणि पूज्य माता यांनीं आपलें पाठबळ दिलें आहे.''  ही वार्ता दयारामजीच्या कानांवर अगोदरच आली होती.  म्हणूनच त्यांनीं मला समक्ष भेटीला बोलावून असें कळकळीचें स्वागत केलें.  त्यांनीं पुढें विचारलें, ''ह्या असपृश्य महिलांच्या सेवेसाठीं आम्ही काय करूं शकुं ?''  मीं उत्तर दिलें, ''आमच्या मध्यवर्ती आश्रमांत निराश्रित सेवासदन या नांवाखालीं एक स्वतंत्र शाखा आम्ही काढूं.''  दयारामजींनीं ताबडतोब दरमहा १०० रु. ची मदत देऊं केली आणि हें सदर निघालें.

पहिली शाळा  :  मिशनची पहिली शाळा १८ ऑ. १९०६ सालीं एल्फीन्स्टन रोडवरील, स्टेशनच्या पूर्वेस मुरारजी वालजीच्या बंगल्यांत निघाली, असें मागें सांगितलेंच आहे.  पण कामाची वाढ झाल्यानें ही जागा पुरेना, म्हणून ह्या स्टेशनाचे पश्चिमेस ग्लोब मिलजवळ एका चाळींत अधिक प्रशस्त जागा घेतली.  मिशनचा पहिल्यापासूनच एक दंडक ठरला होता कीं, मिशनमध्यें काम करणार्‍यांनीं ज्या ठिकाणीं अस्पृश्य लोक राहतात तेथेंच त्यांच्यात मिळूनमिसळून राहावें.  काम करणारांनीं आपल्या कुटुंबासह येऊन राहावें.  मिशनर्‍यांच्या बायकामुलांनीं अस्पृश्य मानलेल्या बायकामुलांमध्यें मिळूनमिसळून राहावें.  ह्या उद्देशाला अनुसरून ग्लोब मिलजवळच्या एका चाळींत मिशनन आपलें ठाणें घातलें.  खालच्या मजल्यांत शाळा, दवाखाना, उद्योगालय वगैरेंची व्यवस्था करण्यांत आली आणि वरच्या मजल्यांत माझे वृद्ध आईबाप, सय्यद अबदुल कादर, त्यांची बहीण आणि तिचा नवरा इतक्यांची राहण्याची सोय करण्यांत आली.  तेथें वरील सदनाची संस्थापना २१ मे १९०७ रोजीं झाली.  ग्लोब मिलच्या आसपास या चाळीला लागूनच एक मोठें पटांगण होतें.  येथें शहराची वस्ती संपली होती आणि उन्हाळ्याच्या दिवसांत मुलांना खेळावयास प्रशसत जागा होती.  पण पावसाळ्यांत या जागेंत मोठी दलदल माजून दोनतीन महिने पाणी सांचून राहात होतें.  त्यामुळें राहण्याला जागा रोगराईची आणि गैरसोईची होती.  म्हणून लवकरच ही जागा सोडून स्टेशनला लागूनच नवीन प्रशस्त बंगला घेतला व तेथें या सदनाचें काम जोरांत चाललें.

हेतु व कार्य  :  मिशनचे हेतु पहिल्यापासूनच पुढीलप्रमाणें होते :  (१) शिक्षणप्रसार, (२) नोकर्‍या मिळवून देणें, (३) सामाजिक अडचणींचें निवारण करणें, आणि (४) सार्वत्रिक धर्म, व्यतिगत शील आणि नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार ह्या गरीब लोकांत करणें.  शेवटचे तीन हेतु वरील सदन निघेपर्यंत साधणें अशक्य होतें.  म्हणून ह्या सदनाचे हेतु खालीलप्रमाणें ठेवण्यांत आले.  वरिष्ठ वर्गांतील जे कोणी उत्साही स्त्री-पुरुष-विशेषतः सुशिक्षित भगिनी-आपणांस वाहून घेऊन मिशनच्या कामासाठीं येण्यास तयार असतील त्यांच्यामध्यें कामाची पात्रता येण्यासाठीं त्यांना तयार करणें आणि अस्पृश्यवर्गांतल्या गरीब स्त्रियांमधून त्यांना कामें देणें.  मिशनचें काम उदार धर्माच्या पायावर चाललें होतें.  त्यासाठीं दर शनिवारीं व्याख्यानें आणि कीर्तनें होत.  रविवारीं सकाळीं धार्मिक शिक्षणाचें वर्ग आणि सायंकाळीं उपासना होत.  प्रथम प्रथम हें काम मी स्वतःच माझ्या बहिणीच्या साहाय्यानें करीत असें.  सदन निघाल्यावर त्याची स्वतंत्र व्यवस्था चांगली झाली.  सणाचे दिवशीं सामाजिक मेळे होते.  त्यांत अस्पृश्यवर्गीय स्त्रीपुरुष वरिष्ठ वर्गांतल्या स्त्री-पुरुषांत समानतेनें भाग घेत.  पहिल्या वर्षी ९ जाहीर व्याख्यानें, ४ कीर्तनें, ५ पुराणवाचनें असे प्रसंग झाले.  भजनसमाज उघडण्याच्या दिवशीं परळ आणि देवनार या शाळेंतल्या सर्व मुलांना व्हिक्टोरिया गार्डनमध्यें फिरवून आणून मिठाई वांटण्यांत आली.  मोहरमचे सुटींत सर्व मुलांना आणखी कांहीं वडील माणसांना घारापुरी येथील लेणीं दाखवून आणण्यांत आलीं.  त्या वेळीं तेथें प्रीतिभोजन झालें.  गांवांतील लोकांपासून जुनेव नवीन कपडे (सुमारें १५००) गोळा करून गरीब लोकांस वांटण्यांत आले.  गरीब बायांसाठीं - विशेषतः कुमारी व विधवा यांच्या शिक्षणासाठीं - शिवणकामाचा वर्ग सुरू करण्यांत आला. त्यांत तयार करण्यांत आलेले कपडेही वांटण्यांत आले.  ह्या लोकांत स्वच्छतेच्या संवयी वाढाव्या म्हणून दर शनिवारीं शाळांतील मुलांना सदनांत स्नान घालण्याची सोय करण्यांत आली.  ह्या साध्या गोष्टीचाही प्रथम प्रथम गैरसमज होऊन बर्‍याच अडचणी येऊं लागल्या.  अस्पृश्यवर्गांतील निरनिराळ्या जातींचीं मुलें एकमेकांत मिसळण्यास कचरत.  चिकाटीनें आणि चतुराईनें काम चालवून या अडचणींतून पार व्हावें लागलें.

शाळा जरी काढल्या तरी त्यावेळीं अस्पृश्यवर्गीय मुलांना शाळेंत रोजच्या रोज जाण्याची सवय नसे व त्यांच्या पालकांना रोजच्या रोजन पाठविण्याची आवड नसे.  शिक्षणाची अभिरुची लावून देण्यासाठीं सदनांतील स्त्रीप्रचारकांना घरोघरीं भेटी घ्याव्या लागत अहसत.  हें काम ख्रिस्ती लोकांचें आहे, असें समजून हे मिशनरी ख्रिस्ती असावे असा गैरसमज होऊं लागला.  त्याचें निराकरण करण्यासाठीं प्रचारक बायांनीं भारत, भागवत, रामायण वगैरे हिंदु लोकग्रंथांचें घरोघरीं वाचन सुरू केलें.  एकादशी, शिवरात्र वगैरे हिंदु सणांचे दिवशीं सदनामध्यें भक्तिविजयासाठीं हिंदु संतांचीं चरित्रें वाचून दाखविण्यांत आलीं.  आजार्‍यांची शुश्रूषा करण्यासाठीं आणि बाळंतपणांत मदत देण्यासाठीं सदनांतील स्त्रियांना शिक्षण देऊन तयार करण्यांत आलें.  श्रीमती वेणूबाई, द्वारकाबाई आणि श्रीमती कल्याणीबाई सय्यद ह्या तीन स्त्रिया सदनांत राहून हीं कामें उत्कृष्ट रीतीनें करीत.  या सदनांतील घरगुती सर्व कामें माझी बहीण जनाबाई जबाबदारीनें पार पाडी.  बाहेरच्या कामाचा सर्व बोजा रा. सय्यद अबदुल कादर यांनीं उचलला होता.  या कामासाठीं निराश्रित महिलासमाज ही निराळी संस्थाच जनाबाईनें काढली होती.  या महिलासमाजाचा पहिला वार्षिकोत्सव मदनपुरा मोरलँड रोडवरील इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चार माड्यांसमोरील मंडपांत त्या वेळीं सौ. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर ह्यांच्या अध्यक्षतेखालीं साजरा करण्यांत आला होता.  गांवांतील प्रमुख स्त्रिया हजर होत्या.  या महिलासमाजाचीं कामें भायखळा व परळ येथें दोन ठिकाणीं स्वतंत्रपणें चालत असत.

समाचार  :  घरोघर भेटीला जाऊन समाचार घेण्याचें काम वर्षभर चालत होतें.  त्या कामाचा फायदा आमच्या निराश्रित भगिनींना कितपत मिळतो हें आम्हांस सांगवत नाहीं, परंतु त्याचा आम्हांला मात्र निरीक्षणदृष्ट्या बराच मिळतो.  ह्यानंतर सौ. रुक्मिणीबाई सय्यद यांनीं भायखळा येथील कामाबद्दलचा वाचलेला रिपोर्ट पुढीलप्रमाणें आहे.  'घरांतील वर्ग सुमारें ६ महिने चालले.  गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूति करण्यांत आली.  पुष्कळांना दवाखान्याचा लाभ देण्यांत आला.  पोलिस कमिशनरकडून बेवारशी मुलें व बायका मिळून ५ आलीं.  त्यांची निगा ठेवण्यांत आली.'

सोमवंशीय मित्रसमाज  :  महिलांच्या समाजाप्रमाणेंच पुरुषांचाही सोमवंशीय समाज स्थापन करण्यांत आला.  इंप्रुव्हमेंट ट्रस्टमधील चाळ नं. ३ मध्यें हा समाज ता. २४ मार्च १९०७ रोजीं स्थापन करण्यांत आला.  ह्याचा हेतु अस्पृश्य लोकांकरवींच स्वोद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घ्यावा असा होता. १९१० अखेर पटावर ४० सभासद होते.  ते दरमहा ४ आणे वर्गणी देत.  दर रविवारीं एकेश्वरी मताच्या उपासना त्यांचेसाठीं चालविण्यांत येत.  १९१० सालीं अस्पृश्यांच्या निरनिराळ्या मोहल्ल्यांतून ह्या लोकांनीं ११ जाहीर सभा घडवून आणल्या.  अशाच एका सभेचे वेळीं एकनाथ व अस्पृश्य जाती या विषयावर माझें जाहीर व्याख्यान झालें.  ह्या मंडळींचा उत्साह इतका वाढला कीं, ह्या समाजासाठीं एक स्वतंत्र उपासनामंदिर बांधावें असा विचार १९०९ नोव्हेंबरमध्यें ठेवून वेळोवेळीं सभा होऊं लागल्या.  ह्यासाठीं फंड जमा होऊन ६५० रु. मुंबई बँकेंत ठेव ठेवण्यांत आली. ती ठेव पंचांच्या नांवें होती.  परंतु कोणत्याही कामांत स्थावर मिळकत येऊं लागली म्हणजे वादाची मुळी पेरल्याप्रमाणें होतें हा अनुभव ह्या लहानशा कामांतही येऊन कांहीं वर्षांनी हें काम बंद पडलें.

अनुभवाचा फायदा  :  ह्या निराश्रित सेवासदनाच्या खर्चासाठीं दयाराम गिडुमल यांनीं दरमहा १०० रु. देणगी दिली होती.  ती तीन वर्षांपूरतीच होती.  सुरुवातीचे अनुभव घेऊन पाहण्यासाठींच हे प्रयोग चालले होते.  त्या दृष्टीनें पाहतां ह्या मिशनला फार लाभ झाला.  प्रचारकांना अशा कामाचा आणि मनुष्यस्वभावाचा जो अनुभव आला तो प्रत्यक्ष कामापेक्षांही अधिक महत्त्वाचा वाटला.  लहान मुलें आणि वयपरत्वें अंथरुणाला टेकलेलीं माणसें यांचे फार हाल होतात, हें माझ्या नजरेस येत असे.  गिरणींत १२ तास काम करणार्‍या माणसांना आपलीं पोटची मुलें आणि वृद्ध जराग्रस्त आईबाप यांच्या जोपासनेस वेळ मिळत नसे, म्हणून अशांची सेवा हेंच सदनाचें मुख्य काम असे.  सदन काढल्याबरोबर माझे आई, वडील व तरुण बहिणी ग्लोब मिलच्या घाणेरड्यां चाळींत जाऊन राहिलीं.

मातेचा लळा  :  अशा कामांतील अनुभवाचीं कांहीं उदाहरणें लक्षांत घेण्यासारखी आहेत.  मुलांना शाळेंत पाठविण्यासाठीं आमच्यावर विश्वास बसावा म्हणून सदनाच्या ठिकाणीं माझ्या आईबापांकडे मुलें आणून ठेवण्याचा प्रयोग करून पाहिला.  लष्करांतून सेवानिवृत्त झालेले एक महार जमादार समजूतदार गृहस्थ होते.  ८ वर्षांची एक मुलगी व ६ वर्षांचा एक मुलगा अशीं दोन अपत्यें त्यांना होतीं.  आठ-आठ दिवस त्या मुलांना आमच्या सदनांत ठेवण्यांत ते कबूल झाले. अगदीं आपल्या पोटच्या पोराप्रमाणें त्यांना ठेवून घेण्यास माझी आईदेखील कबूल झाली.  चंद्राबाई नांवाची माझी धाकटी बहीण नुकतीच वारल्यामुळें विरहाचा मोठा धक्का बिचारीला बसला होता.  त्यांतून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून तिनें हें संगोपनाचें कार्य पत्करलें.  एके दिवशीं सदनांत गोडधोड झालें होतें.  म्हणून लहानग्या गंगूनें (मुलीचें नांव) नेहमीपेक्षां जरा जास्त खाल्लें.  गंगूला आपल्या स्वतःच्या बिछान्यांत घेऊन आई निजत असे.  असा लळा लावल्याशिवाय मुलें घर सोडून राहण्यास तयार होण्यासारखीं नव्हतीं.  मध्यरात्रीनंतर गंगूला अंथरुणांतच जुलाब होऊं लागले.  बिचार्‍या आईनें सर्व अंथरूण धुऊन काढून, मुलीला साफसूफ करून, ऊबदार उपचार करून उजाडण्याचे पूर्वी नीटनीटकें केलें होतें.  मी रागावेन म्हणून घडलेला प्रकार तिनें मला कळविला नाहीं.  तरी तो मला पुढें कळलाच.  मीं माझ्या आईचे पाय धरले.  अशा गोष्टींनीं या लोकांचा विश्वास आमच्यावर हळूहळू बसून पुढें लवकरच आमच्या प्राथमिक आणि दुय्यम शाळा व एक मोठें विद्यार्थी वसतिगृह चांगलें नांवारूपास आलें.

आणखी कांहीं प्रयोग  :  माझी बहीण जनाबाई समाचारास घरोघरीं जात असतांना तिला खडतर अनुभव आले :  (१) एका घरीं एक अगदीं वृद्ध बाई अंथरुणास खिळली होती.  पडून पडून तिच्या पाठीला जखमा झाल्या होत्या.  जनाबाई रोज तिची पाठ शेकण्यास जाई.  तिच्या पाठीला शेकण्याला पाणी तापवण्याकरितां जनाबाई चुलीकडे जाऊं लागली, तेव्हां बाई म्हणाली, ''बाई, तुमचे फार उपकार आहेत; पण माझ्या चुलीला शिवूं नका तुम्हां ख्रिस्ती लोकांनीं चूल बाटविल्यास लोक मला नांवें ठेवून वाळींत टाकतील.''  जनाबाईला आपल्या घरचा स्टोव्ह नेऊन आपलें स्वीकृत काम मुकाट्यानें करावें लागलें.  (२) राही नांवाच्या दुसर्‍या एका वृद्ध बाईला असाध्य जखमा झाल्या होत्या.  मोठ्या सायासानें ह्या बाईला जे. जे. हॉस्पिटलांत पोंचवण्यांत आलें.  दुसरे दिवशीं तिचा समाचार घेण्यासाठीं जनाबाई जाऊन पाहते तों तिच्या तरुण मुलानें तिला घरीं नेलेलें आढळतें आणि हा उपद्व्याप केल्याबद्दल त्याच्याकडून बराच शिव्यांचा प्रसादही मिळाला.  घरीं नेऊन मुलानें आपल्या वृद्ध आईच्या थोबाडांतही मारल्याचें कळलें.  मुलगा दारूच्या नशेंत होता, म्हणूनच हीं कृत्यें त्याच्याकडून पार पडलीं.  तो कामावर गेल्यावर जनाबाई बाईला भेटण्यास घरीं गेल्या.  मुलगा रेल्वेंत मजूर होता.  दारूच्या नशेंत रेल्वे ओलांडीत असतां दोन्ही डब्यांत चेंगरून तो जागच्या जागीं ठार झाला.  तेव्हां त्याची आई, ''बाळा, माझ्या तोंडांत मारायला तरी पुन्हां येरे !''  असे हंबरडे फोडूं लागली.  त्याच शोकांत म्हातारीचा त्या रात्रीं शेवट झाला आणि जनाबाईचें हें हृदयविदारक कामही संपलें.  (३) खालच्या वर्गांत मुरळी सोडण्याची चाल त्या वेळीं जारी असे.  मदनपुर्‍यांत आमच्या शाळेंत येणार्‍या एका मुलीला मुरळी सोडणार आहेत.  असें कळल्यावरून सदनांतील भगिनी चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यास त्या मुलीच्या आईकडे गेल्या.  आपल्या धर्मांत हात घातल्याबद्दल अत्यंत संताप येऊन पुन्हां आमच्या अंगणांत येऊं नका असें त्या मुलीच्या आईनें दरडावून सांगितलें आणि आपल्या मुलीला शाळेंतून काढून घेतलें.  (४) पुण्याच्या डॉ. मॅनकडून मुरळी सोडलेली मुलगी सदनांत आली.  तिला अंगभरून वाईट रोग जडला होता.  तिची कोठेंही व्यवस्था होत नसल्यानें निर्वाणीचा उपाय म्हणून ही मुलगी सदनांत पाठवली गेली; पण मुलांबाळांनीं भरलेल्या सदनांत ही मुलगी ठेवणें धोक्याचें होतें.  म्हणून आमच्या भायखळा येथील शाळेजवळ एक स्वतंत्र खोली घेऊन जनाबाईला तिच्यासाठीं निराळें राहावें लागलें.  मुलगी फार आडदांड स्वभावाची होती.  बरेच दिवस तिनें फार त्रास दिला.  तथापि तिला तसेंच शिकवून बरी केल्यावर आणि ती चांगली शिकल्यावर तिचा योग्य स्थळीं विवाह करून देण्यांत आला.  ही मुलगी महाराची होती.  ही हल्लीं निजाम हैद्राबाद येथें शिक्षकीण आहे.

पुष्कळ बायांना गरोदरपणीं व बाळंतपणीं फार नाजुक उपचार करण्याची पाळी येई.  मिशनचे हितचिंतक मोठमोठे स्त्री-डॉक्टर असत.  ते औषधोपचार सांगत; पण शुश्रूषेचीं कामें सदनांतील स्त्रियांवर पडत.  एनिमा देणें वगैरे नवीन उपचाराचें काम आल्यास जुन्या मताच्या रोग्यांना आवरणें फार कठीण होई.  ते अत्यंत बीभत्स शिव्या देऊन निघून जात.  वेळोवेळीं पोलिसांकडून अनाथ अर्भकें सदनांत पाठवलीं जात.  अस्पृश्य म्हणून इतर अनाथालयांत त्यांचा शिरकाव होणें अशक्य होतें.  अशा मुलांना पंढरपूरच्या आश्रमांत किंवा दयारामशेठनीं मालाड येथें काढलेल्या आश्रमांत पाठविण्यांत येई.

प्रतिष्ठित स्त्रियांची कमिटी  :  अशा प्रकारचीं दयार्द्रतेचीं कामें करण्यास पुरुषांपेक्षां स्त्रियांच्या अंतःकरणाची जोड मिळविणें आवश्यक असतें.  या सदनाच्या कामामुळें तेंही लवकर घडून आलें.  १९०८ सालीं खालील प्रतिष्ठित स्त्रियांची कमिटी नेमण्यांत आली.  लेडी म्यूर मॅकेंझी - अध्यक्ष; लेडी चंदावरकर - उपाध्यक्ष; मिसेस स्टॅनले रीड - चेअरमन; सौ सीताबाई सुखटणकर आणि सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या जॉईंट सेक्रेटरी; कु. एस. के. काब्राजी - खजिनदार; ह्यांपैकीं डॉ. वासुदेवराव ह्यांची पत्‍नी सौ. सीताबाई सुखटणकर ह्या पूर्वाश्रमींच्या मँचेस्टर डोमेस्टिक मिशनचे चालक रेव्हरंड बिशप ह्यांची कन्या.  ह्यांनीं इंग्लंडमध्यें असतांनाच ह्या मिशनला तेथील युनिटेरियन लोकांची सहानुभूति मिळवून एकंदर ७०० रु. पाठविले होते.  त्या हिंदुस्थानांत आल्यावर त्यांनीं ह्या स्त्रियांच्या कमिटीचा सेक्रेटरीपणा पत्करला; पण पुढें डॉ. सुखटणकरांना लवकरच मुंबई सोडून लाहोरला जावें लागल्यानें ह्या बाईंचा मिशनशीं फारसा संबंध उरला नाहीं.  ह्या कमिटीवरच्या मोठमोठ्या घरंदाज बायकांनीं व्यक्तिशः मिशनची वेळोवेळीं फार काळजी घेतली आणि मोठमोठे निधि जमवून मिशनला दिले.  लेडी म्यूर मॅकेंझी यांनीं त्यांचे पति कांहीं दिवस ऍक्टिंग गव्हर्नर असतांना १९०९ सालीं महाबळेश्वर येथील शाखा उघडण्यास गव्हर्नरच्या बंगल्यांत सभा भरवून प्रत्यक्ष मदत केली.  १९०९ सालच्या सप्टेंबर महिन्यांत पुण्याच्या शाळेच्या बक्षिससमारंभांत अध्यक्षस्थान स्वीकारून लेडी म्यूर मॅकेंझीनें जोरदार भाषण करून श्रीमंतवर्गाचें लक्ष मिशनकडे वळविलें.  मलबार हिलवरील आपल्या बंगल्यांत आपल्या कमिटीची सभा भरवून त्यांनीं निधि मिळविण्यासाठीं नाना प्रकारचे उपाय सुचविले.  'टाइम्स ऑफ इंडिया' कर्ते सर स्टॅनले रीड यांच्या पत्नींनीं १९०९ सालीं मिशनमधील सर्व मुलांचा एक मेळा भरवून त्यांना खाऊ वांटला.  सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तर रात्रंदिवस मिशनचें काम करण्यांत चूर असत.  लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर वरचेवर निराश्रित सदनांत समाचाराला येऊन खाऊच्या पाट्यांच्या पाट्या भरून विद्यार्थ्यांना वांटीत असत.  प्रसिद्ध दादाभाई नौरोजी यांची नात सौ. पी. कॅप्टन (मुंबई असि. पोस्टमास्तर जनरल यांची पत्‍नी) ह्या प्रसिद्ध देशाभिमानी बाईनें सौ. सुखटणकरांच्या पाठीमागें सेक्रेटरीपणा पत्करला.  पुढें पुण्याची शाखा सुरू झाल्यावर तळेगांव-दाभाडे येथें रात्रीची आणि दिवसाची शाळा मिशननें काढली.  तिचा सर्व खर्च ह्या दंपतीनें दिला आणि पुण्यांतल्या शाखेला एक शिवण्याचें यंत्र व हार्मोनियम बक्षीस दिला.

विद्यार्थी वसतिगृह  :  ह्या सदनाच्या कार्यांतून मिशनच्या कामाच्या ज्या मुख्य मुख्य अंगांची निष्पत्ति झाली त्या सर्वांत महत्त्वाचें काम म्हणजे मुंबई शाखेचें परळ येथील वसतिगृह होय.  अस्पृश्यवर्गाच्या शिक्षणासाठीं कितीही शाळा आणि उद्योगालयें काढलीं तरी त्यांची खरी उन्नति एवढ्यानेंच होणें शक्य नाहीं.  अशा शाळांतून अस्पृश्यांचीं मुलें दिवसांतून फार तर ५ तास राहून बाकीचा सर्व काळ जोंपर्यंत आपल्या घरगुती वातावरणांत आणि मागासलेल्या समाजस्थितींत घालवितात, तोंपर्यंत त्यांच्या नैतिक जीवनाचा विकास होणार नाहीं याची जाणीव चालकांना पूर्वीपासून होती.  त्यांच्यासाठीं स्वच्छ ऐसपैस जागेंत ह्या कामांत तयार झालेल्या कुलगुरूच्या वैयक्तिक नजरेखालीं दिवसांतून २४ तास विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी, म्हणून वसतिगृहांची जरुरी; पण हें ध्येय सुरुवातीपासूनच कसें गांठतां यावें ?  नुसतें दिवसाच्या शाळेंत येण्यास ज्यांची तयारी नाहीं ते आपल्या गांवाला व आईबापांना सोडून मुंबईसारख्या शहरांत कोठूर राहायला येणार ?  पण निराश्रित सदनाचें कार्य तीन वर्षे चालल्यानें हें ध्येय साधण्याची चिन्हें दिसूं लागलीं.  मिशनच्या शाळांची वाढ या तीन वर्षांत दुय्यम शाळा म्हणजे इंग्रजी ४ थी इयत्ता चालविण्यापर्यंत झाली.  ह्या अवधींत शाळांच्या आसपासच्या निवडक मुलांना घरीं दोनदां फक्त जेवावयास जाऊन बाकीचा वेळा सदनांतच घालविण्याची संवय करण्यांत आली.  स्नान घालणें, कपडेलते, अभ्यासाचीं पुस्तकें, खेळांची उपकरणीं आणि प्रशस्त पटांगण इत्यादि पुरवून घरापेक्षां शाळाच त्यांना अधिक प्रिय वाटेल असा कसून प्रयत्‍न करण्यांत आला.  शेवटीं ४ फेब्रु. १९०९ रोजीं वसतिगृह रीतसर उघडण्यांत येऊन त्याच्या पटावर ११ मुलें नमूद करण्यांत आली.  सप्टेंबर १९०९ पासून त्यांच्या जेवण्याखाण्याचीसुद्धा सोय करण्यांत आली.  १९१० डिसेंबरअखेर पटावर ३६ मुलांची संख्या दाखल झाली.  त्यांतून जरी कांहीं मुलें गेलीं तरी २१ मुलें कायमची शिल्लक उरलीं.  त्यांपैकीं ३ मुली होत्या.  मिशन जरी मुख्यतः अस्पृश्यांसाठीं काढलें होतें तरी पटावरील संख्येपैकीं निदान एकचतुर्थांशाहून जास्त नाहीं इतकी स्पृश्यवर्गीय मुलें घेण्याला मुभा ठेवली होती.  ह्याचा उद्देश दुहेरी होता.  स्पृश्य मुलांशीं मिळूनमिसळून वागून त्यांच्याशीं अभ्यासांत चढाओढ करून व त्यांच्या संवयींचा फायदा घेऊन अस्पृश्यांनीं आपला फायदा करून घ्यावा.  उलटपक्षीं अस्पृश्यांविषयीं जो विनाकरण तिटकारा स्पृश्यांमध्यें असतो तो निराधार आहे हें त्यांच्याशीं प्रत्यक्ष मिसळून पाहण्याची संधि ह्या स्पृश्यांना मिळावी.  केवळ मुलांशीं वागण्यांतच नव्हे तर मोठ्या माणसांमध्यें प्रचार करतांनाही पुढारलेल्या आणि मागासलेल्या समाजाशीं वागतांना, व्याख्यानपीठावरून बोलतांना प्रचारकांना हा दुहेरी हेतु सांभाळावा लागे.  इतकेंच नव्हे तर अस्पृश्यांपेक्षां स्पृश्यांनाच शिक्षण देण्याचें काम कित्येक वेळां अधिक अवघड होत असे.  विद्यार्थ्याचा दैनिक कार्यक्रम येणेंप्रमाणें -

५-०   सकाळीं उठणें.
५-३०  सकाळची प्रार्थना    
६-०   कांजी.
६-३०  बुक बाईंडिंगचें काम.
७-३०  शालेय अभ्यास    
९-०    स्नान व न्याहारी
१०-०   बुक बाईंडिंगचें काम.
११-१-० दिवसाची शाळा.
१-१-३० भोजन.
१-३०-५ दिवसाची शाळा
५-६ व्यायाम.
६-० भोजन.
७-३० - शालेय अभ्यास किंवा रात्रीची शाळा.
१०-० झोंपणें.

 

याखेरीज रविवारीं सकाळीं नैतिक शिक्षण.  तिसरे प्रहरीं विद्यार्थ्यांचें चर्चामंडळ व सायंकाळीं साप्‍ताहिक उपासना होत असत.  स्वयंपाकाकरितां एक बाई नेमलेली असे.  घरकामाकरितां एकही नोकर नसे.  आपापलीं कामें करून सामान्य कामांची वांटणी मुलेंच बिनबोभाट करीत असत.  कोणत्याही प्रकारें कोणत्याही प्रसंगीं जातिभेद पाळला जात नसे.  या बाबतींत कोणीं कधीं तक्रारही केली नाहीं.  अन्न नेहमीं शाकाहारी असे आणि तें विद्यार्थ्यांना मानवलेंही.  स्वच्छता आणि नैतिक बंधनें ह्या दृष्टीनें विद्यार्थ्याच्या वर्तनाकडे कसोशीनें पाहण्यांत येई.  पुरेशा जागेची मोठी उणीव भासत असे.

मोफत दवाखाना  :  हें कामही प्रयोगादाखल १९०६ नोव्हेंबरपासून १९०८ अखेर चाललें.  उद्देश हा होता कीं, औषधाचे द्वारें मिशनचा संबंध या लोकांशीं जडावा व नवीन औषधोपचाराची या लोकांस संवय लागावी.  नोव्हेंबर १९०६ पासून डिसेंबर १९०८ अखेरपर्यंत दोन वर्षे दवाखाना खुला राहून त्यांत १२३९ रोग्यांना दाखल करण्यांत आलें व  वेळां औषधोपचार देण्यांत आले.

 जाती      पुरुष स्त्रिया. मुलें.    एकूण.
   मराठा 
 ६१      ९६    ८१      ३३८
महार २२२ ६४ १६० ४४६
मोची ४८ २२ ७५ १४५
मांग १७ २२ ३ ४२
भंगी   ९ १ ६ १६
सुरती २७ २६ ८६ १३९
मुसलमान ३५ ४१ २१ ९७
ख्रिस्ती ११ १२ ९ ३२
ज्यू ५ १२ १ १८
एकूण    
५३५ २९६ ४४२ १२७३

 

ह्या सर्व कामाचा खर्च २३३ रु. ९ आ. ९ पै आला.  ह्यावरून किती काटकसरीनें हें काम करण्यांत येत होतें, हें दिसून येतें.

शाळाखातें  :  राहतां राहिलेलें महत्त्वाचें काम म्हणजे शिक्षणाचें.  यासाठीं शाळाखातें पसंत करील अशा तज्ज्ञाची मोठी जरूरी होती.  निराश्रित सेवा-सदनाचें काम पाहून आणि त्यासाठीं मिळालेल्या स्वार्थत्यागी माणसांची तयारी पाहून रा. वामनराव सोहोनी या प्रार्थनासमाजाच्या सभासदाला आपल्याला वाहून घेऊन काम करण्याची प्रेरणा झाली.  ते ह्या कामाला सर्वतोंपरी पात्र होते.  सदनांतील प्रचारकमंडळी सदनांतील कामें करूनच तयार झाली.  रा. सोहोनी अगोदर बाहेर तयार होऊनच मिशनला १९०८ सालच्या आरंभीं येऊन मिळाले.  ते आल्याबरोबर त्यांनीं मिशनच्या परळ येथील शाळेचा दर्जा प्राथमिक शाळेंतून दुय्यम शाळेंत वाढविला.  रा. सोहोनींचें काम मागें सांगितलेल्या दोन पद्धतींपैकीं सुवर्णकार पद्धतीचें (Intensive) होतें.  शाळाखात्याचे सर्व नियम संभाळून त्यांनीं हें काम फार चोखपणें केलें.
 

 (१) परळ येथील दुय्यम शाळेंतील पटावरील संख्या-                                  
                          

 

इंग्रजी इयत्ता ४ थी ३
इंग्रजी इयत्ता ३ री २
इंग्रजी इयत्ता २ री ७
इंग्रजी इयत्ता १ ली १५
    २७

  

मराठी इयत्ता तिसरी १७
मराठी इयत्ता दुसरी १५
मराठी इयत्ता पहिली २८
मराठी इयत्ता बिगर ५४
    ११४

 
(२)  देवनार कचरापट्टी प्रथमिक शाळा -

इयत्ता पटावरील संख्या हजेरी
२री ३ ३
१ ली ४ ३
बालवर्ग ३३ २५

 

ही शाळा ठाणें जिल्ह्यांतील चेंबूर येथें उघडण्यांत आली.  ह्या शाळेचे कामीं मुंबई कार्पोरेशनमधील इंजिनियर, रा. अमृतलाल ठक्कर यांचे अविश्रांत श्रम फार उपयोगी पडले.

(३)  मदनपुरा-दिवसाची शाळा -  पटावरील संख्या १२२, पैकीं ९७ मुलें आणि २५ मुली.

(४)  कामठीपुरा - भंगी लोकांसाठीं दिवसाची शाळा - ही एका गुजराथी गृहस्थाच्या उदार आश्रयानें चालू होती.  हिला  प्रथम जागाच मिळेनाशी झाली.  भंगी लोकांचा तिरस्कार इतर अस्पृश्यांनाही वाटत असे.  शिक्षक मिळण्याची मारामार पडूं लागली.  त्यामुळें शाळा बंद पडेल कीं काय असें वाटूं लागलें.  शेवटीं बडोद्यास तयार झालेले एक धेड जातीचे गृहस्थ मिळाले.  पटावरील संख्या ७६ होती.  रोजची हजेरी ६६ होती.  मराठी ४ इयत्तेंपर्यंत शिक्षण दिलें जाई.

कार्यवाहकांची निवेदनें

माझ्या स्वीकृत पवित्र राष्ट्रकार्याचें श्रेय ज्यांनीं ज्यांनीं मजबरोबर वाहून घेऊन स्वार्थत्याग केला, ज्यांनीं सन्मान्य सेवा केली, ज्यांनीं मधून मधून मदत केली, अशांचें थोडेंबहुत तरी स्मरण मीं येथें केलें पाहिजे.  कांहींजणांनीं आपल्या आठवणी स्वतंत्रपणें पाठवल्या आहेत.  कांहींच्या आठवणी माझे मित्र बी. बी. केसकर ह्यांनीं लिहून पाठवल्या आहेत.  कांहींजण वृद्ध झालेले आहेत, तर कांहींजण कालवश झालेले आहेत.  त्यांच्याविषयीं पुढें दिल्याप्रमाणें हकीकत आहे.

(१) रा, सय्यद अबदुल कादर लिहितात -

माझ जन्म १० ऑक्टो. १८८९ मध्यें जमखंडी येथें झाला.  माझे वडील जमखंडींत बुकबाइंडर होते.  ते धार्मिक वृत्तीचे असून तेथील एका जमातीचे पुढारी होते.  ते आपल्या नोकरीबाहेरचा वेळ धर्मप्रचारार्थ घालवीत.  इस्लामी संस्कृतीला अनुसरून आपल्या समाजांत सामाजिक सुधारणा करण्याकडे त्यांचें लक्ष असे.  मुसलमानांत लग्न लावण्याचा हक्क काजींचा व त्याबद्दल त्याला स्थानिक रिवाजाप्रमाणें फी द्याव लागे.  'शरीयत' प्रमाणें लग्न लावण्याचें काम कोणालाही करतां येतें व त्याबद्दल फी देण्याची जरुरी नाहीं अशी चळवळ माझ्या वडिलांनीं सुरू केली.  हें प्रकरण पुष्कळ ठिकाणीं कोर्टांत जाऊन त्यांत त्यांना यश आलें.  ह्याच वेळीं माझ्या वडिलांची व गुरुवर्य अण्णासाहेब शिंदे यांच्या वडिलांची ओळख झाली.  गुरुवर्य अण्णासाहेब त्यावेळीं जमखंडी हायस्कूलमध्यें शिकत होते.  लग्नाच्या प्रकरणासंबंधीं लॉ रिपोर्टरमधून कांहीं उतारे मराठीमधून करून देण्यांत गुरुवर्य अण्णासाहेबांची फार मदत होत होती.  तेव्हांपासून गु. अण्णासाहेबांकडे माझें जाणें-येणें सुरू झालें.  पुढें गु. अण्णासाहेब प्रार्थनासमाजांत गेल्यानंतर जमखंडीस जेव्हां जेव्हां येत तेव्हां तेव्हां त्यांच्या घरीं उपासना होत.  त्या मला फार आवडूं लागल्या.  पुढें अण्णासाहेब विलायतेला गेल्यावर त्यांच्या घरच्या मंडळींशीं माझा स्नेह जडला.  त्यांच्या मातोश्री फारच प्रेमळ असल्यानें त्यांच्याविषयींचें पूज्य प्रेम अद्याप माझ्या मनामध्यें जागृत आहे.  १९०३ सालीं गु. अण्णासाहेब विलायतेहून परत आल्यावर दौर्‍यावर ते जमखंडीस आले.  त्या वेळीं त्यांच्याबरोबर शिवरामपंत गोखले या नांवाचे प्रचारक होते.  त्या वेळीं गुंडांनीं त्यांचा जो छळ केला त्याचा परिणाम माझ्यावर उत्तम व्याख्यानापेक्षांही अधिक झाला.  धर्मविषयक उदार विचार मनांत येऊं लागले.  १९०४ चे सुमारास कलकत्त्याचे पं. शिवनाथशास्त्री मुंबईस आले तेव्हां मी प्रा. समाजाचा सभासद झालों.  त्याच वेळीं संयुक्त प्रांतांत एक मुसलमान गृहस्थ आर्य समाजांत गेले.  दुसरे एक मुसलमान उत्तर हिंदुस्थानांत ख्रिस्ती झाले होते.  मी मुंबई येथील अंजुमान इस्लाम हायस्कूलमधून मॅट्रिक झालों होतों.  तेथेंच मी हंगामी मास्तर होतों.  तेथील अधिकार्‍यांच्या ऐकण्यांत वरील दोन मुसलमानांचीं धर्मांतरें आल्यावरून व मी प्रार्थनासमाजिस्ट झाल्याचें नजरेस आल्यावरून वरील अधिकार्‍यांनीं मला राजीनामा देण्यास सांगितलें.  ह्या प्रकरणीं त्या शाळेंतील दोन हिंदु मास्तरांस विनाकारण त्रास झाला.  मला धमकीही देण्यांत आली.  १९०७ मध्यें मी पोर्टट्रस्टमध्यें नोकरीला लागलों.  १९०६ मध्यें डि.क्ला. मिशनची स्थापना झाली.  त्या वेळीं मी व माझी बहीण हजराबाई अण्णासाहेबांकडेच राहात होतो.  मिशनच्या कामाला माणसें मिळत नव्हतीं.  पोर्टट्रस्टचें काम सोडून मीं मिशनच्या कामाला वाहून घेतलें.  १९०९ मध्यें प्रार्थनासमाज पद्धतीनें माझा विवाह समाजमंदिरांत झाला.  माझी पत्‍नी सौ. कल्याणीबाई सारस्वत समाजांतील होती.  ह्या विवाहामुळें दोन्ही समाजांत बरीच खळबळ उडाली.  माझ्या पत्‍नीची माझ्या स्वीकृत कायाअ बरीच मोठी मदत झाली.  आम्ही १९१२ मध्यें कर्नाटक शाखा उघडण्यास हुबळीस गेलों.  तेथें १९१६ पर्यंत काम केलें.  नंतर नागपूरची शाखा १ वर्ष चालवली.  पुढें १९२० पर्यंत गु. अण्णासाहेबांचे हाताखालीं असिस्टंट म्हणून काम करीत होतों.  ह्या सर्व क्रांतिकारक व आनंदकारक गोष्टींस कारण कोण असा कधीं कधीं मनांत विचार येतो तेव्हां गु. अण्णासाहेबांची मूर्ति डोळ्यांपुढें उभी राहते.  

ए. एम. सय्यद.
लॅमिंग्टन रोड, मुंबई
ता. २२।३।४१

(२) रा. वामनराव सदाशिव सोहोनी लिहितात  :-

रा. विठ्ठलरावांचा व माझा परिचय ते विलायतेस धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यास जाण्यापूर्वीच्या त्यांच्या मुंबईच्या वास्तव्यांत झाला.  विलायतेहून परत आल्यावर ते प्रा. समाजाचें काम करणार अशी आमची खात्री असल्यामुळें आम्ही त्यांच्या विलायतेहून परत येण्याची चातकाप्रमाणें वाट पाहात होतों.  त्यांनीं सुबोध-पत्रिकेसाठीं धाडलेलीं अनेक पत्रें त्यांच्याविषयींचा आदरभाव वृद्धिंगत करण्यास कारणीभूत झालीं.  प्रा. समाजाचे प्रचारक झाल्यावर त्यांनीं समाजांतील व समाजाबाहेरील अनेक तरुणांना एकत्रित करून प्रा. समाजाच्या जीवनांत नवचैतन्य उत्पन्न केलें.  त्यांच्यासारख्या कर्तबगार माणसाला गिरगांवांतील समाजजीवन हें कार्य करण्यास पुरेसें वाटलें नाहीं ह्यांत आश्चर्य नाहीं.  विलायतेंत असतांना त्यांनीं समाजसेवेच्या भिन्नभिन्न कार्याचें निरीक्षण केलें होतें.  साहजिकपणेंच त्यांचें लक्ष अस्पृश्यांच्या दुःस्थितीकडे वळलें.

१९०६ सालीं होळीच्या दिवशीं आम्ही दोघेजण मुंबईच्या परळ भागांतील अस्पृश्यांची स्थिति अवलोकन करण्यासाठीं गेलों असतां आमच्या नजरेस जे करुणामय देखावे पडले त्यांची विस्मृति होणें शक्य नाहीं.  रा. विठ्ठलरावांनीं भा. नि. साह्यकारी मंडळी स्थापली.  संस्थेतील मुहूर्तमेढ सर नारायण चंदावरकर यांचे हस्तें करण्यांत आली.  मी त्या वेळेस विल्सन हायस्कूलमध्यें शिक्षक होतों.  पण माझें अंतःकरण निराश्रित साह्यकारी मंडळींत होते.  रा. विठ्ठलरावांच्या आग्रहावरून १९०८ मध्यें मीं मंडळीचें मुंबई शाखेचें काम अंगावर घेतलें.  १९०८ ते १९२१ पर्यंत १३ वर्षे मी मुंबई शाखेचें व कांहीं वर्षे मंडळीच्या असि. सेक्रेटरीचें काम केलें.  मंडळीचा श्रेष्ठ उद्देश नजरेपुढें ठेवून तपशिलांत कोणालाही ढवळाढवळ करूं न देतां कार्य करण्याचा माझा प्रयत्‍न होता.  मुंबईच्या कार्याला अनपेक्षित यश आलें.  रा. विठ्ठलराव येथील काम मजवर सोंपवून अस्पृश्यतेच्या कार्याची जागृति करण्यासाठीं देशभर दौरे काढीत.  ऊन, पाऊस, थंडी, वारा, ह्यांना न जुमानतां सांपडेल तेथें वस्ती करावी, मिळेल तें जाडेंभरडें जेवण जेवावें, तिसर्‍या वर्गांतून कधीं कधीं चौथ्या वर्गांतून (काठेवाडांत) प्रवास करावा, अशा प्रकारचें त्यांचें दगदगीचें जीवन होतें.  त्यांची शरीरयष्टि बळकट व काटक म्हणूनच ते इतक्या प्रचंड गैरसोयी साहूं शकले !

अस्पृश्यतानिवारणाला रा. विठ्ठलरावांच्या आधीं महात्मा ज्योतिबा फुले यांनीं सुरुवात केली.  मुंबईच्या प्रा. समाजानेंही अस्पृश्यांच्या शिक्षणाला अल्प प्रमाणावर सुरुवात केली होती.  परंतु मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित प्रयत्‍न रा. विठ्ठलरावांनींच केले.  त्यांच्या कुटुंबांतील सर्व मंडळींनीं अस्पृश्यतेचा प्रश्न आपलास केला होता.  त्यांना अनेक उच्चवर्णीय तरुणांचें साहाय्य मिळालें.  पण कार्याची धडाडी रा. विठ्ठलरावांची.  अस्पृश्यांनीं स्वावलंबी बनावें, उच्चवर्णीयांच्या तोंडाकडे न पाहतां आपली सुधारणा आपणच करावी, पण ती करतांना दुसर्‍याशीं अकारण वितुष्ट वाढवूं नये अशी त्यांची दृढ भावना होती व तिला अनुसरून त्यांचें कार्य होई.  त्यांनीं अस्पृश्य बालकांची स्वतःच्या बालकांप्रमाणें केलेली सेवा मीं प्रत्यक्षपणें पाहिलेली आहे.  मुंबईच्या विद्यार्थीगृहांत अस्पृश्यांच्या सर्व जातींचीं मुलें एकत्र राहात व कोणताही भेदाभेद न करतां खाणेंपिणें होई.  त्यांची टापटीप, त्यांची स्वच्छता, त्यांच ज्ञानलालसा, त्यांची वागणूक व त्यांचें परस्पर साहाय्य अवलोकून विठ्ठलरावांना अत्यंत आनंद होई.

मुंबई शाखेनें ८ शाळा चालवल्या होत्या.  त्या शाळांची कार्यक्षमता आजूबाजूच्या स्पृश्य रहिवाश्यांच्या नजरेस आल्यामुळें स्पृश्यांचीं मुलेंही विशेषतः परळ येथील मुलांमुलींच्या शाळांत प्रविष्ट होऊं लागलीं.  त्यांच्या संख्येला आळा घातला नसता तर ह्या शाळा स्पृश्यांच्याच झाल्या असत्या.  स्पृश्य मुलांच्या भरतीनें संस्थेचा हेतु शेवटास जाण्यास बरीच मदत झाली.

माझ्या मतें रा. विठ्ठलरावांनीं दोन मोठ्या चुका केल्या.  त्यामुळें संस्थेची कार्यक्षमता कमी झाली असा माझा समज आहे.  पहिली गोष्ट म्हणजे पुणें हें संस्थेच्या कार्याचें मुख्य ठिकाण केलें.  इतर कोणत्याही कारणांनीं हें योग्य झालें असतें; पण द्रव्यसाहाय्य मिळवण्याच्या दृष्टीने तें निरुपयोगी होतें.  दानशूर मंडळी विशेषतः मुंबईस असल्यामुळें मुंबईंत संस्थेच्या मालकीची इमारत असणें आवश्यक होतें व तीमुळें (ह्या शहरांत १ लक्षांवर अस्पृश्य आहेत.)  त्या शहरांतील कार्याला स्थायिकता आली असती.  दुसरी चूक म्हणजे- संस्थेच्या कार्यकारी मंडळांत केवळ एकाच राजकीय मतांच्या लोकांचा शिरकाव करणें ही होय.  ह्या मंडळीचे हातून बरेंच काम होईल असा त्यांचा विश्वास असावा.  पण तो केवळ भ्रम ठरला.

मला राहून राहून एका गोष्टीविषयीं दुःख होतें.  अस्पृश्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठलरावांनीं.  त्या कामीं कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनीं व त्यांच्या कुटुंबियांनीं देशभर जागृति घडवून आणली.  ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळवण्याचे यशस्वी श्रमही त्यांचेच.  पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हां जेव्हां उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हां तेव्हां ज्यांनीं ह्या बाबतींत केवळ वाचिक कार्य केलें आहे अशांनाच झालेल्या जागृतीचें श्रेय अर्पण करण्यांत येतें व भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी व विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशील बहिष्कार घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाहीं.  रा. विठ्ठलराव श्रेयाला हपापलेले आहेत असा प्रकार नाहीं.  पण अशा संघटित बहिष्कारानें सत्त्याचा अपलाप होतो.  आपल्या अखिल जीवनानें व सेवाव्रतानें रा. विठ्ठलरावांनीं आपली केवढी उन्नति केली आहे ह्याची साक्ष देण्याला हजारों अस्पृश्य मंडळी आजही हयात आहे.

वामनराव सदाशिव सोहोनी, मुंबई


(३)  रा. दामोदर नारायण पटवर्णन लिहितात  :-  १९०९ ते १९१२ पर्यंत बरेच वेळां सहवासाचे प्रसंग आल्यामुळें रा. शिंदे ह्यांच्या कार्यांत शिक्षक म्हणून नुसतें वरवरचें काम न करतां प्रत्यक्ष प्रचारक म्हणून वाहून घ्यावें असा निश्चय होऊं लागला.  त्यामुळें हायकोर्ट वकिली किंवा सरकारी ट्रेनिंगकडे न जातां मी बराच वेळ ह्या संस्थेंतच घालवूं लागलों.  १९१२ पासून १९२१ पर्यंत रा. शिंदे ह्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालींच मीं काम केलें.  ह्यामुळें विविध प्रसंगीं त्यांच्या स्वभावविशेषांचें जें दर्शन झालें त्याचा सारांश खालीं देत आहें.

सर्वांशीं समानतेची वागणूक  :-   रा. शिंदे मराठा समाजांतील प्रख्यात विद्वान् असल्यामुळें त्यांच्याकडे श्रीमंत, सरदार, नामांकित विद्वान् हे भेटीस येत.  त्याचप्रमाणें पत्करलेल्या कामामुळें अस्पृश्यांतील अविद्वान् व दरिद्री माणसेंसुद्धा येत.  अशा वेळीं आपणांकडून करतां येईल ती त्यांची कामगिरी करून त्यांना संतोषित करून वाटेला लावणें हें मोठें कौशल्याचें काम आहे.  पण हें काम रा. शिंदे आपल्या गोड व सुविनीत वाणीनें उत्तम प्रकारें पार पाडीत.  अशिक्षितांच्या सभा असोत कीं सुशिक्षितांच्या परिषदा असोत.  प्रत्येक प्रसंगीं त्या त्या उपस्थित समाजास योग्य असा शब्दसमूह वापरून त्यांचीं व्याख्यानें होत.  आलेल्यांचें आदरातिथ्य आपल्या पदरास खार लावून व घरच्या मंडळींस कष्टवूनही ते करीत.  आपल्या प्रोफेसर व श्रीमंत मित्रांप्रमाणेंच अस्पृश्यांनाही ते वागवीत.  यामुळेंच श्रीमंत व गरीब यांमधील संबंध जुळवणारा हा परोपकारी दुवा माझ्यासारख्यांना फार आवडे.  त्यांचा हा वागणुकीचा कित्ता मीं आपल्यापुढें ठेंवला आहे.

राष्ट्रीय कार्याची तळमळ  :  रा. शिंदे प्रत्येक पक्षाच्या लहानथोर कार्यकर्त्यास आपला काय्रक्रम नीटपणें समजावून देत व आपल्या कार्यास सर्व पक्षांची जरुरी आहे व हें सर्व पक्षांनीं करावयाचें राष्ट्रीय कार्य आहे अशी त्यांची खात्री करून देता.  त्यामुळें त्यांचे पक्षातील धोरण संस्थेला फायदेशीरच झालें.  आपण पत्करलेलें काम सामाजिक व शिक्षणविषयक असलें तरी वेळोवेळीं होणार्‍या राजकीय व सामाजिक कामांतून इतर पक्षांबरोबर सहकार्य न भितां करीत.  कामाची राष्ट्रीयता ओळखण्याची पात्रता व तळमळ ही मीं बरेच प्रसंगी अनुभवलेली असल्यामुळें व मला तेंच तत्त्व पटल्यामुळें माझी रा. शिंदे यांजवरील निष्ठा वाढली.  राष्ट्रीय चळवळींत सर्व पंथ, धर्म, वर्ग व पक्ष एकजीव होऊन झटले तरच यश मिळतें.  पण कधीं कधीं रा. शिंदे यांच्या या धोरणामुळें आमच्या संस्थेंतील अधिकारी म्हणजे कै. डॉ. भांडारकर, न्यायमूर्ति चंदावरकर इत्यादि सभासदांचा रोषही त्यांना सोसावा लागला.  

(३)  सहकार्‍यांशीं बंधुत्वाचें वर्तन :   वयानें मी लहान असल्यामुळें माझ्याशीं ते धाकट्या भावाप्रमाणें वागत व माझ्या कुटुंबांतील मंडळींशींहि तसेच वागत.  त्यांच्या कुटुंबांतील मंडळींशीं म्हणजे सौ. वहिनीसाहेब व भगिनी जनाबाई ह्या आम्हाला वहिनी-भगिनीप्रमाणेंच वाटत व वाटतात.  डी. सी. एम. सोडतांना आमचा मतभेद व वादविवाद चांगलाच झाला, पण त्याचें कार्य झाल्यानंतर आतां माझ्या मनांत मागील स्नेहाचीच आठवण येते व पुण्यास मी जातों तेव्हां एकदां तरी त्यांचे भेटीस जाऊन येतों.  अस्पृश्यतानिवारकांचे रा. शिंदे गुरु असल्यामुळें थोड्यांशा मतभेदामुळें त्यांच्या गुणांची योग्यता कमी करणें कधींही अयोग्यच ठरेल.

दा. ना. पटवर्धन

(४)  रा. गणेश हरी टंकसाळे यांच्याविषयीं खालील मजकूर आला आहे.

ता. १ ऑक्टोबर १९२० रोजी पुणें शाखेंत दाखल झाले.  पहिलीं दोन वर्षें त्यांनीं शिक्षकाचें काम केलें.  नंतर रा. शिंदे यांनीं त्यांची अस्पृश्यांविषयींची कळकळ पाहून त्यांना पुणें शाखेच्या असि. सुपरिंटेंडेंटच्या जागीं नेमलें.  संस्थेकरितां वर्गणी जमवणें, सभा भरवून त्या पार पाडणें, गरिबांना डोल वांटणें वगैरे कामें ते आपुलकीनें व मेहनतीनें करीत.  १९२९ च्या सुमाराला त्यांनीं मिशनचें काम सोडलें.  त्या वेळीं त्यांच्या सत्कारार्थ सभा भरवून पानसुपारी करण्यांत आली.  गुरुवर्य शिंदे ह्यांच्याविषयीं त्यांच्या मनांत किती आदर वसत होता हें त्यांनीं त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त केलेल्याकाव्यावरून दिसून येण्यासारखें आहे.

(५)  प. वा. कृष्णराव गोविंदराव पाताडे  :-

हे मूळचे मूरबाडचे राहणारे.  हे मराठा जातीचे होते.  लहान असतांना गिरण्यांतून वगैरे काम करून स्वावलंबनानें मॅट्रिकपर्यंत अभ्यास केला.  पुणें, बंगलोर, मुंबई वगैरे शाखांतून यांनीं मोठ्या धडाडीनें कामगिरी केली.  अस्पृश्यवर्गावर विशेषतः मद्रासकडील अस्पृश्यांवर ह्यांचें फार वजन असे.  हे राष्ट्रीय वृत्तीचे होते.  पर्वती सत्याग्रहाच्या कामीं यांनीं निकराचा भाग घेतला होता.

ह्यांचें विशेष धडाडीचें काम म्हणजे हिंदुस्थानचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनीं भोकरवाडीला दिलेली भेट होय.  लॉर्ड आयर्विन हे हिंदुस्थानांत प्रथम आले.  तेव्हां त्यांनीं एके ठिकाणीं उद्‍गार काढले कीं, ''गरिबांची स्थिति प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहण्याची माझी फार इच्छा आहे.''  लॉर्ड आयर्विन यांना वेळ मुळींच नव्हता, म्हणून सर्व सार्वजनिक कार्यक्रम त्यांनीं बंद ठेवले होते.  पण रा. शिंदे ह्यांनीं व्हाइसरॉयसाहेबांना एक खाजगी चिठ्ठी लिहून ती रा. पाताड्यांना दिली.  रा. पाताडे हे बालवीर चळवळींत मोठा भाग घेत.  शनिवारवाड्यांपुढें बालवीरांची मोठी रॅली (मेळा) जमली होती.  रा. पाताडे यांनीं बालवीराचा गणवेश चढवला आणि गर्दीत ज्या ठिकाणीं मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन् आणि व्हायरॉय लॉर्ड आयर्विन् उभे होते तेथें शिरकाव करून प्रायव्हेट सेक्रेटरीच्या हातीं श्री. शिंद्यांची चिठ्ठी दिली.  सर लेस्ली विल्सन् यांनीं नुकतीच मिशनला भेट देऊन भोकरवाडी पाहिली होती.  त्यांच्या शिफारशीवरून लॉर्ड आयर्विन् यांनीं ता. १ ऑगस्ट १९२६ रोजीं रविवारीं सकाळीं १० वाजतां अहल्याश्रमास भेट दिली.  बरोबर सर लेस्ली विल्सनही होते.  पोलिसांनीं कडक बंदोबस्त ठेवला होता.  पाहुण्यांना मिशनच्या संस्था दाखवल्यावर भोकरवाडीच्या अरुंद आणि गलिच्छ चाळी त्यांना दाखविण्यांत आल्या.  दोन एकरांहून कमी जागेंत दोन हजारांहून जास्त जिवंत माणसें कशीं गर्दीनें राहत होतीं, हें व्हाइसरॉयनीं समक्ष पाहिलें.  एका बाईच्या कडेवर एक वर्षाचें उघडें-नागडें लहान मूल होतें !  तें व्हाइसरॉयनीं पाहिलें.  रा. शिंदे म्हणाले, ''हिचें नांव हिंदुस्थानची गरिबी !''  पण मुलीच्या आईनें तोर्‍यानें सांगितलें, ''हिचें नांव लक्ष्मी !''

१९२० सालच्या सुमारास महात्मा गांधींनीं दांडीचा सत्याग्रह केला.  त्या वेळीं पुणें शाखेचे सेक्रेटरी रा. पाताडे व सुभेदार घाडगे यांनीं दांडी येथें जाऊन त्यांस जोराचा विरोध केला होता.  याचें कारण ते राष्ट्रीय सत्याग्रहाच्या उलट होते असें नव्हे, तर महात्माजींनीं मिठाचा सत्याग्रह करण्यापूर्वी अस्पृश्यतेच्या विरुद्ध अगोदर सत्याग्रह करावा.  दांडी येथील गदाअत ह्या दोघांनीं शिरून तेथील मिठाचें मडकें आपल्या ताब्यांत विरोध दर्शविण्यासाठीं घेतलें होतें.  मोठी दंगल माजली.  गोष्ट गांधीजींच्या कानांवर गेली.  दोघांनींच इतका विरोध चालवलेला पाहून त्यांना मोठें कौतुक वाटलें.  त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होऊं नये असा बंदोबस्त केला.  आपल्या विरोधाची खूण म्हणून कित्येक दिवस रा. पाताडे यांनीं हें मडकें अहल्याश्रमांत जपून ठेवलें होतें.  पुढें महात्माजींनीं तुरुंगांत उपोषण केलें. पूना पॅक्ट झाला.  त्यांना भेटण्यासाठीं रा. शिंदे व पाताडे येरवड्यांच्या तुरुंगांत गेले.  महात्माजींनीं रा. पाताडे यांस हंसत जवळ बोलावलें आणि ते म्हणाले, ''दांडी येथील तुमच्या विरोधाची किंमत मी ओळखतों.  तुरुंगांतून सुटल्यावर एक वर्ष मी तुमच्या अस्पृश्यतेच्या कामाला वाहून घेईन.  त्या सबंध वर्षांत अस्पृश्यतानिवारणाशिवाय दुसरें कांहीं काम मी करणार नाहीं.''

१९३३ सालीं रा. पाताडे यांची प्रकृति बरीच खालावत चालली.  ता. २२ मार्च १९३३ रोजीं सर सयाजीराव गायकवाड ह्यांचें आगमन झालें.  त्या वेळीं मोठा समारंभ झाला.  त्या समारंभाच्या तयारींत रा. पाताडे यांस फार मानसिक व शारीरिक श्रम पडले.  पुढें उन्हाळा आला व त्यांचा मानसिक बिघाड झाला.  रामनवमीच्या दिवशीं तर त्यांना वेड लागलें.  त्यांना मिळावें तसें गृहस्वास्थ्य न मिळाल्यानें त्यांच्या मेंदूवर विकृत परिणाम झाला.  ह्या वेळीं त्यांचा सदतिसावा वाढदिवस होता.  येरवड्यांच्या वेड्यांच्या इस्पितळांत त्यांना पाठवण्यांत आलें. तेथें त्यांना न्युमोनियाचा विकार होऊन शेवटीं ता. १४ एप्रिल १९३३ रोजीं त्यांचा अत्यंत दुःखद अंत झाला.  ह्या सुमारास रा. शिंदे इंदोर, उज्जैनकडे प्रवासांत होते.  रा. पाताडे यांच्या निधनाची तार त्यांना आगगाडींत पोंचली.  त्यांना जबर धक्का बसला.  रा. पाताडे त्यांना पोटच्या मुलांप्रमाणें प्रिय होते.

(६) ह्याशिवाय द. स. बर्वे, पाठक यांनींही पुणें शाखेंत बर्‍याच कळकळीनें काम केलें आहे.  रा. बर्वे हे हुबळी शाखेंतही कांहीं वेळ होते.  तेथून ते नागपूर शाखेंत गेलें.  तेथेंच ते अद्यापि एकनिष्ठनें मिशनचें काम चालवीत आहेत.

साहाय्यकारी  :  याशिवाय खालील सदगृहस्थांनीं व भगिनींनीं मिशनच्या कमिटीवर बाहेर राहून मिशनला अमोलिक साहाय्य केलें आहे.

(१)  अध्यक्ष सर नारायण गणेश चंदावरकर  :-   ह्यांचें चरित्र महशूरच आहे.  सतत बारा वर्षांवर त्यांनीं केलेल्या कामाचा ठिकठिकाणीं उल्लेख आलेलाच आहे.  मिशनचे ते अत्यंत आदर्श अध्यक्ष होते.  दरसाल शंभर रुपयांची वर्गणी ते नियमानें पोंचवीत आणि यापेक्षां महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनीं कमिटीवर बहुमोल कामगिरी केली.  ते नेहमीं कमिटीला अत्यंत वक्तशीर येत.  त्यांच्या धाकामुळें इतर सभासदही वेळेवर येत.  कामाच्या अडचणी ते जाणून असत.  कित्येक वेळां मिशनच्या निरनिराळ्या शाखांच्या कमिट्या आणि तेथील स्थानिक मिशनरी यांच्यामध्यें मतभेद होऊन तक्रारीचीं प्रकरणें वेळोवेळीं जनरल सेक्रेटरीकडे येत.  कामाला माणसें मिळत नसत आणि वेळोवेळीं त्यांच्याशीं वर्दळीला आल्यानें त्यांच्यावर अन्याय होत होता.  अशा वेळीं जनरल सेक्रेटरीस फार सहनशीलता दाखवणें भाग पडे.  बंगलोर शाखेहून असाच एक वादग्रस्त प्रश्न तेथील सन्माननीय सभासदांनीं सेक्रेटरीकडे पाठवला.  सेक्रेटरी दाद घेत नाहींत असा त्यांचा समज होऊन त्या गृहस्थानें तक्रारीचें लिखाण अध्यक्षांकडे पाठवलें.  अध्यक्षांनीं तें प्रकरण जनरल सेक्रेटरीकडे जसेंच्या तसेंच पाठवलें आणि पुढें त्याची विचारपूसही केली नाहीं.  ह्याचा अर्थ अध्यक्षांनीं आपल्या कामाची हेळसांड केली असा नाहीं तर कारभाचा मुख्य अधिकार जनरल सेक्रेटरीकडेच असल्यानें विनाकारण त्यांच्या अधिकारांत ढवळाढवळ करणें बरें नव्हे असें शहाणपणाचें धोरण त्यांनीं नेहमीं ठेवलें होतें.

(२)  उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला  :-  मृत्यु १३।११।१९१३.  सन १८९८ त मुं. प्रा. चे सभासद झाले.  स्वतःचा खर्च फार थोडा.  पण बहुजनांच्या हितासाठीं धन पाहिजे हें डोळ्यांपुढें ठेवून ते रात्रंदिवस राबत असत.  मिळालेल्या संपत्तीचा उपयोग सार्वजनिक कार्याकडे करीत.  मुंबई फोर्टमध्यें पांच लक्ष रुपये खर्चून पीपल्स फ्री रीडिंग रूम हें वाचनालय स्थापन केलें.  अशींच १०।१२ ठिकाणीं वाचनालयें काढलीं.  गिरगांवांतील राममोहन आश्रम, ब्रिस्टल येथील राममोहन राय समाधीचा जीणोद्धार, कलकत्त्यांतील राममोहन राय लायब्ररी, मुंबईची पुअर बॉईज सेमिनरी, अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी, सदाशिव पांडुरंग केळकर स्मृतिफंउ इत्यादि संस्था स्थापन करण्याचें श्रेय त्यांच्या उदार देणगीकडेच येतें.  इतकें करून ते फार शांत आणि निरपेक्ष वृत्तीचे असत.  आपल्या उदार देणग्या प्रसिद्ध न करण्याविषयीं फार जपत.  ते पुण्याची शाखा समक्ष येऊन पाहून गेले होते.  मिशनला सुमारें ७००० रु. ची त्यांनीं देणगी दिली.  १९०९ सालीं ते महाबळेश्वरीं गेले असतां रा. शिंदे आणि त्यांच्या कुटुंबांतील मंडळींना त्यांनीं बरोबर नेलें.  तेथें एक महिना त्यांचा मुक्काम होता.  त्या मुक्कामांत महाबळेश्वर येथें मिशनची शाखा निघाली.

(३)  सौ. लक्ष्मीबाई रानडे  :-  मृत्यु ता. १७।६।१९१३.  ह्या सुशिक्षित असून त्यांनीं सेवासदन व डी. सी. मिशनतर्फे उत्तम जनसेवा केली.  साळुंब्रें येथील अग्निप्रळ्याचे वेळेस दुःखितांचे मदतीस धावून गेल्या.  त्यांच्या अंगीं मोठा सभाधीटपणा होता.  शास्त्रेक्त गायनाचा फार नाद असे.  दिलरुबा उत्तम वाजवीत.  डी. सी. एम. चे फंड गोळा करण्याचे कामीं फार मदत केली.

(४)  गिरिजाशंकर त्रिवेदी  :-  मृत्यु ता. १०।१।१९३२ निरपेक्षपणें व एकनिष्ठपणें त्यांनीं प्रा. समाजाची सेवा केली.  पंढरपूर ऑर्फनेजकरतां त्यांनीं मोठा द्रव्यनिधि जमवला.  डी.सी. मिशनला मनोभावें मदत केली.  पुढें थोडीं वर्षे ते जनरल सेक्रेटरी होते.  राममोहन राय हायस्कूल काढण्याची मूळ कल्पना त्यांचीच.  ह्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठीं त्यांनीं ५ हजार रु. ची देणगी दिली.  

(५)  डॉ. काशीबाई नवरंगे  :-  ह्यांची डी. सी. मिशनला बिनबोभट मदत होत असे. हल्लीं या मुंबई प्रा. समाजाच्या अध्यक्ष आहेत.  नायगांव येथें गिरण्यांत काम करण्यासाठीं यांनीं संस्था काढून पुष्कळ चांगलें काम करीत आहेत.

(६)  द्वा. गो. वैद्य:-  हे प्रा. स. चे आजन्म सेवक होते.  सु. पत्रिकेच्या द्वारें डि. सी. मिशनची बाजू निर्भीडपणें मांडीत असत.  प्रा. स. चा इतिहास, रानडे, भांडारकर, चंदावरकर, यांचीं चरित्रें लिहून वाङ्‌मयांत अमूल्य भर टाकली आहे.

(७)  डॉ. संतुजी रामजी लाड :-  हे धनगर जातींतील एक जुने पुढारी.  ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे मोठे अभिमानी होते.  डॉ. संतुजी रामजी लाड ह्यांस नोव्हेंबर १९१६ या महिन्यांत पक्षाघाताचे विकारानें ठाणें येथें देवाज्ञा झाली.  हे पेन्शन घेतल्यावर कित्येक वर्षे मुंबई येथील मराठा प्लेग हॉस्पिटलचे हाउस सर्जन होते.  हे मोठे हुशार डॉक्टर व कनवाळू वृत्तीचे होते.  यांनीं प्लेग हॉस्पिटलांत आलेल्या एका मुलाचें उत्तम रीतीनें संगापेन केलें व तो हल्लीं कॉलेजांत शिकत आहे. पंढरपूर ऑर्फनेजमधून ह्यांनीं दोन मुली समाजाकडून मागून घेतल्या व त्यांचें प्रतिपालन करून त्यांचीं लग्नें लावून दिलीं.  नि. सा. मंडळीच्या ५ आद्य संस्थापक सभासदांपैकीं हे एक आहेत.  ह्या मंडळींनीं चालवलेल्या परळ येथील दवाखान्यांत ते ठाण्याहून रोज येत.  डॉ. लाड ह्यांनीं 'दीनबंधू' वर्तमानपत्र डबघाईस आलें असतां स्वतःच्या पैशाचे जोरावर त्या पत्राचा अकालमृत्यु टाळला; पण त्यासाठीं डॉ. लाड यांना आपली सर्व संचित संपत्ति खर्चावी लागली.  कोणीहि संकटांत-सांपडला असें कळलें कीं, डॉ. संतुजी त्याच्या साहाय्यासाठीं धावत असत.

(८) रा. पांडुरंग भास्कर गोठोस्कर  :-  सावंतवाडी संस्थानांत ता. ६।८।१८७३ सालीं यांचा जन्म झाला.  हायस्कूलचें शिक्षण त्यांचे मामा डॉ. भांडारकर यांचेकडे झालें.  मुंबई येथें त्यांचे मामेभाऊ श्रीधरपंत भांडारकर यांचेजवळ राहून ते B.A. झाले.  रॉयल एशिऍटिक सोसायटीमध्यें ते लायब्रेरियन् होते.  १९३० सालांत त्यांनीं पेन्शन घेतलें.  प्रकृति वरचेवर बिघडत असतांही त्यांनीं अनेक सार्वजनिक संस्थांत दगदगीचें काम केलें.  डि. क्ला. मिशनमध्यें त्यांनीं फार कसोशीनें काम केलें.  जनरल सेक्रेटरी कोंकणांत फिरतीवर गेले असतां सावंतवाडी येथील आपल्या नातलगांस परिचय पत्र देऊन त्या प्रांतीं मिशनचें काम करण्यास मोठी मदत केली.  १९१३ सालीं त्यांनीं एका गतभर्तृकेशीं केलेला विवाह व अस्पृश्यांचे उन्नतीविषयीं त्यांची स्वक्रीय सहानुभूति वगैरे गुण पांडुरंगपंतांमध्यें आले, त्याचें श्रेय भांडारकरद्वयांच्या घरांतील उदार वातावरणालाच आहे.

(९) अमृतलाल व्ही. ठक्कर  :  मुंबई कॉर्पोरेशनमध्यें इंजिनियर होते.  नि. सा. मंडळीच्या आरंभापासून हे मोठे सन्मान्य साह्यकारी होते.  चेंबूर येथें महालक्ष्मी रोड, माजगांव येथें भंग्यांच्या चाळीजवळ वगैरे ठिकाणीं शाळा उघडून अस्पृश्यांचें काम करण्यास त्यांनीं मोठी मदत केली.  काठेवाडांत आणि बांकीपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनांत जनरल सेक्रेटरीबरोबर प्रवास करून मिशनच्या मोठमोठ्या जाहीर सभा करण्याचे कामीं ह्यांनीं मोठी मदत केली.  ह्यांचे धाकटे बंधु नारायणजी मिशनचे स्वयंसेवक या नात्यानें मोठ्या उत्साहानें काम करीत.  भोकरवाडी येथील अहल्याश्रमाच्या इमारती बांधण्याचे कामीं नकाशे व अंदाजपत्रकें तयार करण्याचें मोठ्या दगदगीचें काम यांनीं मोठ्या दक्षतेनें केलें.  पुढें भिल्लांच्या सुधारणेचें काम काढून ठक्करबाप्पा हें सार्थ नांव त्यांनीं मिळवलें.  गोखले यांच्या भारत सेवक समाजांत हें एक नामांकित कार्यकर्ते आहेतं.  महात्माजींनीं अस्पृश्यतानिवारणासाठीं शेट बिर्ला यांची मोठी मदत मिळवून मोठा फंड जमवला आणि शेवटीं दिल्लीस मध्यवर्ती हरिजन संघ काढून तो ठक्करबाप्पांचे स्वाधीन केला.  गेल्या सालीं ठक्करबाप्पांचा ७१ वा वाढदिवस मुंबई येथें थाटानें झाला.  त्यासाठीं ७० हजार रुपयांवर फंड जमवण्यांत आला.  जाहीर सभेंत गोपाळराव देवधर आणि विठ्ठलराव शिंदे यांच्या जुन्या आठवणी मोठ्या आदरपूर्वक ठक्करबाप्पांनीं काढल्या आणि ते समक्ष रा. शिंदे यांना येऊन भेटले आणि त्यांनी आशीर्वाद मागितला.  

(१०)  लक्ष्मणराव बळवंतराव नायक, बी.ए.  :   ह्यांचा संबंध मिशनशीं मूळ आरंभापासून तों आतांपर्यंत टिकून राहिला.  रुपी फंडाचे कॅप्टन, असि. जनरल सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी आणि शेवटीं ट्रस्टी या नात्यानें मिशनचीं मोठमोठ्या अधिकाराचीं कामें मनोभावानें मुकाट्यानें आणि दक्षतेनें केलीं आहेत.  प्रथम प्रथम मिशनला दरसाल १०० रुपये वर्गणी त्यांच्याकडून मिळे.  हल्लीं ते प्रकृतीनें फार अस्वस्थ आहेत.  तथापि मिशनकडे त्यांचे सारखें लक्ष आहे.

(११) के. रंगराव  :  नि. सा. मंडळी निघण्यापूर्वी १० वर्षे ह्यांनीं मंगळूर येथें अस्पृश्यांकरितां संस्था काढली होती.  म्हणून ह्यांना माझे साथीदार म्हणण्यापेक्षां मी त्यांचा साथीदार म्हणणेंच श्रेयस्कर.  ब्राह्म समाज व अस्पृश्यसेवा यांकरतां ह्यांनीं स्वार्थावर पाणी सोडून आपला सर्व जन्म वेंचला, जीवापाड श्रम केले व अनन्वित छळ सोसला.  हे उत्तम वकील होते.  जीविताचे अखेरीस चतुर्थाश्रम पत्करून ईश्वरानंद हें नांव घेतलें.  ता. २ फेब्रु. १९२८ रोजीं मरण पावले.  ह्यांच्या तीन मुली पदवीधर असून मोठ्या जमीनदारांस दिल्या आहेत.  पैकीं मधल्या सौ. राधाबाई मद्रासचे प्रसिद्ध जमीनदार पुढारी सुब्बरायन यांची पत्‍नी होय.

कांही संवयी आणि वागणूक

हा काळ संपविण्यापूर्वी माझ्या कांहीं संवयी व कांहीं विशिष्ट वागणूक यासंबंधीं आठवणी देणें बरें.  माझ्या वयाच्या ६ व्या वर्षी मी प्राथमिक शाळेंत गेलों आणि १२ व्या वर्षी हायस्कुलांत गेलों.  १९ वें वर्ष संपण्यापूर्वी माझें दुय्यम शिक्षण संपलें.  ह्या तिन्ही टप्प्यांत माझ्या स्वभावांत निरनिराळे फरक पडून अधिकाधिक विकास घडत असलेला मला देखील कळून येत होता.

पेहरावा  :  प्राथमिक शाळेंत असतांना माझ्या पोषाखाचे बाबतींत मी फार गबाळ्या होतों.  कर्नाटकांत प्राथमिक शाळेंत जाण्याच्या वयांतही लहान मुलें रुमालच बांधीत असतात.  अजूनही खेड्यांत तेथें हाच प्रकार दिसतो.  पुणेरी टोपी मीं सबंध हायस्कुलांत असतांना घातली नाहीं.  पुण्यांत कॉलेजांत आल्यावर मोठमोठीं बी.ए.च्या वर्गांतलीं मुलें नेहमींच-आणि मोठे प्रोफेसरही केव्हां केव्हां-टोपी घातलेलीं पाहून आम्हां कर्नाटकीयांना मोठेंच आश्चर्य वाटे.  आमच्या हायसकूलच्या काळांत पुणेरी टोप्या जमखंडी येथील दुकानांत विकत मिळणेंच संभवनीय नव्हतें.  मग कोट आणि वास्कुटांचें नांवच घ्यावयाला नको.  खादीच्या बंड्यां आणि वरतीं केव्हां तरी घालावयाला लांब झग्याचे व अस्तन्यांचे मांजरपाटी आंगरखे आणि नेसण्यास धोतरें असत.  डोईला कर्नाटकी जाडाभरडा रुमाल.  तो मला प्राथमिक शाळेंत असतांना तरी नीट बांधावयाला येत नसे !  ब्राह्मणांचीं मुलें लंगोटी घालीत; पण घरंदाज मराठ्यांचीं मुलें धोतरें किंवा विजारी घालावयाचीं.  धोतरें मळलेलीं, आंगरख्यावर शाई सांडलेली आणि रुमालाच्या एकदोन फेरी गळ्यांत आलेल्या, कसें तरी अस्ताव्यस्त बांधलेलें खडर्यांचें दप्‍तर आणि पाटी सांवरीत १०-१०॥ वाजतां आमची स्वारी दुडद्रुड धांवत येई.  भूक इतकी लागलेली असे कीं, आईला ओरबाडून खाण्याची तयारी !  आमच्या सोप्यांत समोरच्या भिंतींत एकावर एक असे दोन मोठे कोनाडे असत.  वरच्या कोनाड्यांत दप्‍तर, पुस्तकें वगैरे आणि खालच्यांत कपडे ठेवावयाचे असत.  पण मी हें सर्व उभ्याउभ्याच फेकून देत असें.  तें सर्व नीट ठेवण्याचें काम माझ्या मोठ्या भावाचें किंवा आईचें.  बाबांच्या दाबामुळें आंघोळ केल्याशिवाय गत्यंतरच नसे; पण ती आंघोळ त्याच मासल्याची, म्हणजे सगळें आंग कांहीं भिजावयाचें नाहीं.  मात्र कपाळावर गंधाचा नाम मात्र मोठा ओढलेला.  त्यामुळें बाबांचें लक्ष आंघोळीच्या व्यंगाकडे जात नसे !

साधी राहणी  :  पोषाख भपकेदार करणें किंवा दागदागिने घालून नटणें ह्याची मला लहानपणापासून कधींच आवड नव्हती.  हायस्कुलांत गेल्यावर पोषाखांतला गैदीपणा कमी झाला.  तरी माझें लक्ष अश गोष्टींकडे फारसें नसे.  साधेपणा मला नेहमींच आवडे.  बरेच दिवस अंगांत बाराबंदी बंडीच असे.  अलीकडचा ज्याला (छातीवर गुंड्यां लावलेला) सदरा म्हणतात हा प्रथम मिळाला, तेव्हां मला मोठा आनंद झाला.  तो अर्थात् खादीचा होता.  तो दिवस श्रावणी सोमवार होता.  हा नवीन कपडा घालून मी रामतीर्थास रामेश्वरास जाऊन आलों.  एकटाच होतों.  वाटेंत किती वेळां तरी माझ्या ह्या नवीन संपत्तीकडे पाहून मीं स्वतःचे अभिनंदन करून घेतलें म्हणून सांगूं !  ह्या वेळीं मी फार तर १२ वर्षांचा असेन.

प्राथमिक शाळेंत असतांना मला एक चमत्कारिक खोड होती.  सहज उभा असतांना माझ्या दांतांतून जीभ बाहेर आलेली दिसे. तें मला कळतच नसे.  बाबांनीं मला नेहमीं टोकावें, तरी मी आपला बावळटासारखा दांतांत जीभ काढून उभाच.  माझी मलाच शरम वाटे; पण ही खोड कांहीं बराच काळ गेली नाहीं.

स्नान  :  हायस्कुलांत गेल्यावर माझ्यांत किंचित् व्यवस्थितपणा आला; पण त्याची केवळ लहर येऊन जाई.  ती लहर आली कीं, मग सर्व वस्तु व्यवस्थित ठेवण्याच्याच नादांत मी गुंगत असें आणि ती ओसरून गेल्यावर पुन्हां येरे माझ्या मागल्या !  हायस्कुलांत गेल्यावर मी नेहमीं थंड पाण्यानें स्नान करावयाला विहिरीवर जात असें आणि जातांना माझे, बाबांचे व इतरांचेही पांढरे कपडे धुवावयास नेत असें.  जमखंडीस पाण्याचा तुटवडा असे.  चांगल्या स्वच्छ व मुबलक पाण्याच्या विहिरी १।-१॥ मैलावर असत.  तितकें लांब जाऊन स्वच्छ स्नान करून, कपडे धुऊन, व्यवस्थित घड्यां घालून मी परत येत असें.

अखंड सहवास  :  घरांतली माझी मैत्रीण म्हणजे माझी धाकटी बहीण जनाक्का.  ही आमची जोडी जन्मभर आहे.  अगदीं लहानपणीं आमची गट्टी जमण्याचे आणि फू होण्याचे हेलकावे घड्यांळ्याच्या लंबकापेक्षांही वारंवार होत असत.  दर सेकंदास भांडणारीं आम्ही भावंडे झोंपेंतच काय तीं अलग होत असूं.  माझा वडील भाऊ आमचें भांडण मिटवीत असे; पण तो वारल्यावर जणूं मिटविणारा कोणी नाहीं म्हणून कीं काय आमचें भांडणच मिटलें !  खरें पाहतां माझा स्वभावच बदलला.  माझ्या बहिणीवरच्या सात्त्विक प्रेमाचा वाढता प्रवाह संथपणानें अखंड वाहूं लागला.  माझा शाळेंतला अभ्यास, माझें खासगी वाचनाचें व्यसन, माझ्याभोंवतालचा सततचा सोबत्यांचा गराडा ह्या सर्व विक्षेपाला न जुमानतां मी माझ्या बहिणीशीं खेळत असें.  आतां मी आणि ती वृद्ध झालों आहों, तरी आमच्या सहवासांत खंड नाहीं.

गुळळव्वा  :  नवरात्र आलें कीं जनाक्काचा चिमुकला घट निराळा बसविणें, गणेशचतुर्थी आली कीं तिचा छोटा गणपति निराळा मांडणें, आषाढांतला मंगळवार आला कीं तिची गुळळव्वा सजविणें या नाना प्रकारचे खेळांची सजावट ती सासरीं जाईपर्यंत करण्यांत मी मोठा आनंद मानीत असें.  आमच्या ह्या बालमैत्रीचें कौतुक करून आमची आई आम्हांला उत्तेजन देत असे.  गुळळव्वा ही एक कर्नाटकी ब्राह्मणेतर मुलींची मंगळागौरच म्हणावयाची.  देवळाच्या शिखराप्रमाणें एक चिखलमातीचें लहानसें देऊळ कुंभाराकडून दाणे घालून आम्ही विकत आणीत असूं.  मग त्याला गुंजा, बटगुंजा व करडीचे पांढरे दाणे मी कलाकुसरीनें चिटकवीत असें.  हिची पूजा मंगळवारीं रात्रीं होई.  एका जेकावर (चिखलाचा ६ इंचांचा एक लहानसा खांब) एक आडवी चोय ठेवून तिला दोन्ही टोकांना चिखलाच्या पणत्यांतून दिवे लावून ते गरगर फिरवून आम्ही गुळळव्वापुढें खेळत असूं.  चिखलाचा एक रेडा करावयाचा, त्याच्या पाठीला एक खळगा करून त्यांत कुंकवाचें पाणी भरावयाचें आणि चिखलाच्याच सुरीनें तो रेडा गुळळव्वापुढें कापावयाचा.  ह्या कामांत माझा हातखंडा.  दुसरे दिवशीं बुधवारीं गुळळव्वाचं विसर्जन करावयाला आम्ही जनाक्काच्या मैत्रिणी घेऊन डोंगरांत जाऊन संबंध दिवसभर खेळून येत असूं.  तेव्हां शिदोर्‍या, लाह्या, खोबरें ह्यांची लयलूट !  हें एक बाळ वनभोजनच.  खरें पाहतां हा खेळ मुलींचाच.  मी गेलों म्हणजे मुली ''शेळ्यांत लांडगा आणि बायकांत हांडगा'' असें म्हणून माझी टिंगल करीत.  तरी पण जनाक्कासाठीं तें सर्व सोसून तिच्या खेळाचें सुख मी भोगी.  मी माझ्या वाचनांतल्या गोष्टी व सहलींतील अनुभवही जनाक्काला वेळोवेळीं सांगून तिला मी माझ्या ज्ञानाच्या व माहितीच्या पातळीवर ( Level ) ठेवण्याचा सतत प्रयत्‍न करी.  जनाक्काचा प्रतियोगी सहकार असावयाचाच.

घरकामाची लहर  :  लहर आली म्हणजे मी आईच्या घरकामालाही हातभार लावीत असें.  विशेषतः सणावारीं स्वयंपाकघरांत कांहीं गोडधड होऊं लागलें कीं, माझ्या मातृभक्तीला पूर यावयाचा !  नागपंचमीचे लाह्यापाठीचे लाडू, गणेशचतुर्थीचे मोदक, नवरात्रीच्या कडाकण्या, दिवाळीच्या करंज्या-कडबोळीं, मोहरमांतला मलीदा-चोंगे वगैरे खाण्याचे पदार्थ करण्याला माझीं पुस्तकें टाकून तिच्या पुढेंपुढें मी इतका सुळसुळत असें कीं, जणूं तिची मी एक सूनच !  आईनें पुरण घातलें कीं कणीत मऊ करण्याला मी काच्या मारून दुःशासनवधासाठीं जसा भीम असा सज्ज होई !  अशा वेळीं रामायण-भारतांतले वामनाचे श्लोक, मोरोपंतांच्या आर्या आईपुढें म्हणून दाखविण्याचा तोंडाचा पट्टा एकदां का सुरू झाला, कीं कणीक मऊ झाली तरी हें साग्रसंगीत दुःशासनवध चालूच राही.  मग आई तिकडे न कां ऐकेना !  ''अरे विठ्या, लांकडांचें असतें तर हें तोंड केव्हांच झिजलें असतें कीं रे !''  असें आई कानडींत म्हणे.  जनाक्का मात्र मोठी कामचुकार असे.  खायला मी आणि कामाला माझा मोठा भाऊ, हा तिचा बाणा असे.

अव्यवहारीपणा  :  डोंगरांतून जळाऊ लाकडांचा भारा आणून आईला मदत करण्याचें एकदां अस्मादिकांनीं मनांत आणिलें.  लागलीच एक कुर्‍हाड व एक मोठी दोरी मी घेऊन निघालों.  पण शेवटीं ''जेनु काम तेनु थाय, बिजा करेसो गोते गाय'' असाच शेवटीं प्रकार घडला.  जाळण्याला अगदीं निरुपयोगी अशा कांटेरी झुडुपांचा भारा मीं तयार केला.  पण तो कांहीं केल्या मला घरापर्यंत आणतां येईना.  रात्र पडावयाला झाली तरी हा गडी घरीं येईना, म्हणून आई अर्ध्या वाटेवर मला हुडकायला आलेली भेटली.  भारा अर्ध्या वाटेवरच टाकून कसें यावें लागलें ही रडकथा आईस सांगण्याची पाळी आली.  कसली लांकडें गोळा केलीं हें आईनें विचारतां त्या झुडुपाचा मासला दाखविला.  तिनें कपाळाला हात मारून म्हटलें, ''हायस्कुलांत पहिला नंबर मिळाला तरी जळाऊ लाकूड कोणतें व त्यांचा भारा घरापर्यंत कसा आणावा हें व्यवहारज्ञान तुला नाहीं रे पोरा !  लाकडें नाहींत तीं नाहींत, पण दोरी मात्र डोंगरांत टाकून हात हालवीत आलास.  काय तुझी तारीफ !''  ही गोष्ट मी मोठा झाल्यावर आई मला सांगून कितीदां तरी हिणवीत असे.  मी किती जरी पंडित झालों, तरी प्रपंच चालविण्याचें शहाणपण माझ्यांत येईल कीं नाहीं ह्याविषयीं ती साशंकच असे.  माझ्या भावी आयुष्यांत ही माझ्या आईची शंका खरी ठरली !

बाजारांत जाऊन एखादा जिन्नस खरेदी करून आणणें मला आवडत नसे.  तें व्यवहारज्ञान माझेमध्यें शेवटपर्यंत आलें नाहीं.  ह्यासंबंधींची एक मजेची गोष्ट मला आठवते ती अशी.

बाजारांतील शोभा :  शाळेंत माझा अभ्यास उत्तम असे.  विशेषतः गणितांत मी हुषार होतों.  रामजीबावांचा विठू म्हणजे इंग्रजी शाळेंतला एक मोठा वाखाणण्यासारखा मुलगा, अशी गांवांत प्रसिद्धि झालेली होती.  पण माझें शिक्षण सर्व नव्या तर्‍हेनें झालेलें असल्यानें जुन्या गांवठी शाळेंतल्याप्रमाणें मोडी अक्षर वळणदार काढणें, हस्तलिखित मोडी पत्रें वाचणें, तोंडचे हिशेब करणें हें उपयुक्त आणि व्यावहारिक शिक्षण मला मिळालें नव्हतें.  त्यांत माझा लाजाळू स्वभाव !  त्यामुळें मी बाजारांत जाणें नेहमीं टाळीत असें.  मोहदीनसाहेब नांवाच्या वाण्याचे दुकानांत आमच्या घरचें उधारी खातें होतें.  त्या दुकानांत जाऊन जिन्नस आणावयाचें मी टाळीत असें.  पण एकदां कांहीं सामान आणणें मला भागच पडलें, म्हणून मी गेलों.  कधीं दुकानांत न येणारा शाळेंतला मोठा नांवाजलेला मुलगा आलेला पाहून, मोहदीनसाहेबांनीं तोंडचे हिशेब मला कसे काय येतात तें पाहण्याची कसोटी चालविली.  मी जें चुकवीत होतों तेंच पुढें आलें.  मला कांहीं त्यांच्या साध्या प्रश्नांस उत्तरें देतों येईनात.  मग काय ?  त्यांना माझीच नव्हे तर नवीन इंग्रजी शिक्षणाचीही टर उडविण्याची अमोलिक संधि आयतीच मिळाली.  त्यांच्या दुकानांत नेहमीं बसणारा उठणारा त्यांचा एक अडाणटप्पू मित्रही जवळच बसला होता.  मला कांहींच सांगतां येईना, तेव्हां माझ्या अंगाला दरदरून घाम आला !  खालीं घातलेली मान वर करवेना कीं उठून जाववेना !  जवळ बसलेल्या त्या टोळभैरवाचें नांव रामय्या असें होतें.  माझी अशी भिरकंडी उडालेली पाहून रामय्यानें दांटगट कानडी भाषेंत म्हटलें, ''वजन करणार्‍या शेराचा दगड घाल त्याच्या कपाळांत; म्हणजे तरी कांहीं उत्तर सुचेल.  काय म्हणे हा शाळेंत पहिला नंबर आहे !  आणि येवढा साधा हिशेब विचारला, तर बोबडी वळली, द्या ढकलून त्याला खालीं.  बघतां काय !''  मोहदीनचें दुकान आमच्या शाळेसमोरील मारुतीचे देवळाला लागून भर चौकांत असलेलें.  ही शोभा झाल्यावर कित्येक महिने त्या दुकानासमोर फिरकण्याचें देखील मला धैर्य होईना !

कांही टिपणें

युनिटेरियन समाज  :  ज्या युनिटेरियन लोकांकडून हिंदुस्थानांतील ब्राह्मसमाजाच्या प्रतिनिधिविद्यार्थ्याला मँचेस्टर कॉलेजांतून धर्मप्रचारासाठीं तयार करण्याप्रीत्यर्थ स्कॉलरशिप मिळते तो इंग्लंडांतील युनिटेरियन समाज आणि हिंदुस्थानांतील ब्राह्मसमाज या दोहोंचीं धर्मतत्त्वें, आचाराचें आणि कार्याचें धोरण स्थूल मानानें पाहातां जवळजवळ सारखेंच उदारपणाचें आहे.  हिंदुस्थानांतील निरनिराळ्या ब्राह्मसमाजांची व प्रार्थनासमाजांची संख्या, मीं १९१२ सालीं प्रसिद्ध केलेल्या Theistic Directory मध्यें हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांतील मिळून एकंदर संख्या १६७ आहे.  इंग्लंड, आयर्लंड व वेल्स मिळून एकंदर युनिटेरियन समाजांची संख्या १९०३ सालच्या Unitarian Pocket Book मध्यें दिल्याप्रमाणें ४५६ आहे.  पण ब्राह्मसमाजापेक्षां युनिटेरियन समाजाची घटना किती तरी पटींनीं अधिक कार्यक्षम व सांपत्तिक स्थिति अधिक अनुकूल असल्यामुळें हिंदुस्थानांत आजन्म वाहून घेतलेले ब्राह्मधर्मप्रचारक आणि आचार्य फार थोडे म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत आणि त्यांत पद्धतशीर रीतीनें तयार करून घेतलेले २।४ असतील किंवा नसतील.  इंग्लंडांत अशा प्रचारकांची संख्या १९०३ मध्यें ३७४ होती.  सर्व युनिटेरियन कामकाज आवरण्यासाठीं लंडनमध्यें British and Foreign Unitarian Assoiation नांवाची एक संस्था आहे, तशी हिंदुस्थानांत नाहीं.  साधारण ब्राह्मसमाज नांवाची कलकत्त्यांत एक मध्यवर्ती संस्था आहे.  पण तिचा ताबा सगळ्यांवर सारखा चालत नाहीं.  न्यूयॉर्कमध्यें American Unitarian Assoiation  नांवाची एक मध्यवर्ती संस्था आहे.  कलकत्ता, लंडन आणि न्यूयॉर्क या तिन्ही मध्यवर्ती संस्थांकडून परस्पर सलोख्याचें सहकार्य घडतें.  हें काय आजपर्यंत जवळजवळ शेंसव्वाशें वर्षांपासून चालत आलें आहे.

साधनसभा  :  ता. १० नोव्हेंबर १९०१ च्या आदितवारीं संध्याकाळीं ६ वाजतां आमचे कॉलेजबंधु मि. कॉक यांचे घरीं साधनसभा होती.  जेवण तेथेंच झालें.  परस्परांची हकिकत सांगितली.  त्यांच्या घरीं मि. कॉक व त्यांची बहीण दोघेच आहेत.  मोठ्या आनंदाननें दिवस घालवत आहेत.  दोघें अत्यंत ममताळू व सात्त्विक आणि हिंदुधर्माचे व तत्त्वज्ञानाचे चाहते आहेत.  दोघे Theosophist आहेत.  मि. कॉक हा स्वतः खाटकाचा मुलगा असून पूर्वाश्रमीं बरेच दिवस खाटकाचा धंदा करूनही, हा आणि ह्याची बहीण आतां पूर्णतः शाकाहारी बनलीं आहेत.  आध्यात्मिक भाव व भक्ति वाढविण्याकरितां नियमित वेळीं आम्ही एकत्र जमून कांहीं साधन करण्याचें त्यांनीं सुचविलें.  माझे मनांत हें होतेंच.  त्यांस मीं चांगलेंच प्रोत्साहन दिलें.  घरीं परत आल्यावर जेवतांना मिस्टर व मिसेस ग्रेडन (ज्यांचेकडे मी भाड्यांनें राहात होतों) यांच्याशीं मांसाहाराबद्दल कडाक्याचा वाद झाला.  मी हिंदुस्थानांत असतां कधीं कधीं मांस खात असें; पण तें अजिबात सोडावें असें मला वाटत नव्हतें.

येथें आल्यावर मी केवळ सात्त्विक अन्न घेत असें.  दोघां ग्रेडननीं मला मांस घेण्याविषयीं फार आग्रह केला.  सुमारें तीन महिने आमचा शाकाहार चालू होता; पण पुढें शाकाहार चांगलासा न मिळाल्यानें मला शिसारी आली.  अंगांत फार अशक्तता आल्यानें मला शेवटीं तो सोडावा लागला.

नाताळची पहिली सुट्टी  :  ता. ८ डिसेंबर १९०१ रोजीं दोन प्रहरीं १ वाजतां ऑक्सफर्ड येथून निघून लंडनला ३ वाजतां पोंचलों.  ग्रेजइन रोड, कॅल्थोर्म स्ट्रीट नं. ७ येथें खोली घेतली.  स्वामी निर्विकल्प यांचे शिष्य रा. राजाराम पानवलकर आणि नाशिकचे व्यापार-शिक्षणासाठीं आलेले रा. पंगे हे दोघे लगतच्या खोलींत असत.  पानवलकर आम्हां तिघांसाठीं हातानें स्वयंपाक करीत.  तो आम्हांस फार गोड लागे.  तो सात्त्विक व शुद्ध वनस्पतीचाच असे.  यांचे सोबतींत लंडन चांगलेंच पाहावयास मिळालें.

मिस् मॅनिंग  :  दोन प्रहरीं ३ वाजतां मिस् मँनिगचे घरीं गेलों.  तिला किती आनंद झाला !  इकडचें तिकडचें बोलणें झाल्यावर तिनें आपली लायब्ररी दाखवली. नंतर हिंदुस्थानची चित्रें, मौजेच्या वस्तु, रुप्याचीं भांडीं वगैरे तिनें मोठ्या अभिमानानें दाखविलीं.  प्रत्येक हिंदी मनुष्याबद्दल आणि वस्तूबद्दल हिचें किती निष्काम प्रेम दिसलें !  हिनें हिंदुस्थानांत प्रवास केला होता आणि मिस् मेरी कार्पेन्टरबाईप्रमाणें हिंदुस्थानच्या सामाजिक सुधारणा व शिक्षण यांबद्दल ती झटत असे.  मिस् मॅनिंगला 'द्रौपदी व सुदेष्णा' हें रविवर्म्याचें चित्र मीं भेटीदाखल दिलें.  तें तिला फार आवडलें.

दादाभाई नौरोजी :  लंडन इंडियन सोसायटी नांवाची लंडनमधील सर्व हिंदुस्थानवासियांची व मित्रांची सभा पार्लमेंटच्या इमारतीजवळ पॅलेस चेंबरमध्यें दर पंधरवड्यांस शनिवारी भरे.  दर बैठकींत सोसायटीचे अध्यक्ष परमपूज्य दादाभाई नौरोजी हेच चेअरमन असत.  एकदां आमचे मित्र रा. राजाराम पानवलकर यांचे 'इंग्रजी साम्राज्याखालील स्वराज्याची आवश्यकता' ह्या विषयावर एक तासभर इंग्रजींत भाषण झालें.  त्यानंतर चौघांची भाषणें झालीं.  मीही बोललों.  बोलणारे सर्वच तरुण, अजाण व अननुभवी होते.  तरी दादाभाई सर्वांचें म्हणणें शांतपणें ऐकून घेत होते व त्यांचें आपल्या नातवांप्रमाणें कौतुक करीत होते.  व्याख्यान आटोपतांच ह्या मुलांनीं त्यांस अनेक प्रश्न सलगीनें विचारले.  त्यांची फोड त्यांनीं मोठ्या आवेशानें केली.  म्हातारा देहानें वृद्ध असे खरा पण त्याचा उत्साह तरण्यापेक्षां तरुण असे.  सभेचे सेक्रेटरी वागळे यांस बोलतां बोलतां थट्टेनें म्हणाले, ''अरे, तूं मूर्ख आहेस रे.  आतां मी तुला शिव्या हांसडीन पहा.''

एक जागृतींतलें स्वप्न  :  एकदां पॅस्मोर इन्स्टिट्यूटमध्यें इटालियन चित्रकार ह्या विषयावर मॅजिक लँटर्नसहित लेक्चर झालें.  तें ऐकावयास गेलों असतां मनांत एक प्रेरणा झाली.  माझे मित्र राजाराम पानवलकर यांस ती केव्हां सांगेन असें मला झालें.  घरी आल्यावर आम्ही रात्रीं १ वाजेपर्यंत ह्या प्रेरणेसंबंधीं बोलत बसलों.  राजारामास ती फार रुचली.  ती अशी :- राजारामानें मजबरोबर ऑक्सफर्ड येथें राहावें.  परवानगी घेऊन मँचेस्टर कॉलेजांतील कांहीं व्याख्यानें ऐकावींत.  राजाराम हे विशेषतः उद्धारक मताचे, तर मी सुधारक मताचा.  असे जरी आम्ही आहोंत तरी दोघांचीं अंतःकरणे शुद्ध हेतूनें भरलेलीं असल्यानें आम्हीं एकमेकांस लवकर जाणलें व मैत्री जमली.  तो हिंदुस्थानांतील 'आर्य संघाचा' एक कट्टर सभासद आहे व मी प्रार्थनासमाजाचा आहें.  पण आतां भेद उरला नाहीं.  इतकेंच नव्हे तर आम्ही एकमेकांच्या संस्थांचे सभासद झालों व आमच्या भावी आयुष्याचा मार्ग रोखूं लागलों. Theosophy,  मांसाहारनिषेध, योगसाधन या ज्या पौरस्त्य चळवळी येथें चालू आहेत त्यांचें राजारामानें रहस्य जाणून घ्यावें, पुस्तकसंग्रह करावा, माणसें जोडावींत, युनिटेरियानिझम, युनिव्हरसॅलिझम (Universalism)  सारख्या ज्या पाश्चात्य चळवळी आहेत त्यांचा ठाव मीं घ्यावा असें ठरलें.  आम्ही दोघांनीं मिळून येथें दीड वर्ष राहिल्यावर प्रथम दोघांनीं मिळूनच युरोप खंडांतून प्रवास करावा.  रोम, अथेन्स, पॅलेस्टाइन, मक्का, कैरो इत्यादि पुरातन व पवित्र स्थळीं यात्रा कराव्यात.  तेथील देखाव्यांचे फोटो घ्यावेत.  त्यासाठीं राजारामानें ऑक्सफर्ड येथें फोटोग्राफी शिकावी.  उदार धर्मावर आम्ही जागोजाग व्याख्यानें देऊन आपला निर्वाह करावा.  युरोपांत प्रवास झाल्यावर नंतर जपान व चीन देशांतून परत कलकत्ता, मद्रास शहरांवरून स्वदेशीं जावें.  वाटेंत व्याख्यान देणें, स्नेह संपादणें, बंधुता वाढविणें हाच धंदा ठेवणें इत्यादि.  गुरुवारचा दिवस पवित्र समजून त्या दिवशीं कोठें तरी बाहेर जाऊन यासंबंधानें व्रतग्रहण करण्याचें ठरवून आम्ही निजलों.  पण झोंप लागली नाहीं.  तथापि पुढें याप्रमाणें कांहींही झालें नाहीं, हें सांगावयास नकोच.

रे. चार्लस व्हायसे  :  दुपारीं ११ वाजतां रे. चार्लस व्हायसेच्या चर्चमध्यें उपासनेस गेलों.  हें एका बोळांत आहे.  एक तास गीतें गाणें, उतारे वाचणें, प्रार्थना करणें इत्यादि झाल्यावर १२ पासून १२॥ पर्यंत रे. व्हायसे यांनीं उपदेश केला.  हे अगदीं कडक सुधारक असून एकेश्वरी पंथाचे आहेत.  यांना युनिटेरियानिझमही पसंत नाहीं.  कारण त्यांत ख्रिस्ताचेंच पुढारीपण आहे.  युनिटेरियन लोकांत शुष्कवाद न करतां, मिळून काम करण्याचा मोठा गुण दिसून येतो.  तो व्हायसे यांनीं घेतल्यास दोघांसही जास्त बळ येईल.  पण या गोष्टीस व्हायसेचीच नाखुशी दिसते.  चर्चमधील व्यवस्था फार चांगली आहे.  सुमारें १०० उपासक हजर होतें.  दारांत व्हायसेची पुष्कळ पुस्तकें विकण्यास ठेविलीं होती.  बोळांत शिरतांच एक छापील व्याख्यान फुकट मिळतें.  संध्याकाळीं पुन्हां उपासना होते.  दोन्ही वेळां धर्मार्थ पैसे गोळा होतात.  सर्व इंग्लंडांत इतक्या उदार मताचें हें एकच Theistic चर्च आहे.  हें आमच्या ब्राह्मसमाजाप्रमाणेंच निव्वळ एकेश्वरवादी आहे.

शेरलॉक होम्स  :  रात्रीं ८ वाजतां नाटकास गेलों.  'शेरलॉक होम्स' चा प्रयोग झाला.  तिकिटाची किंमत २॥ शिलिंग पडली.  नाटकांत संगीत अगर कसलाही रस नव्हता.  गुप्‍त पोलिस  याचें काम छान वठलें.  ह्या लोकांचें लक्ष अभिनयाकडे जास्त आहे.  तें त्यांना चांगलें साधलें आहे.  रंगभूमि व नेहमींची रहाटी यांत मुळींच फरक दिसला नाहीं.  हीच खुबी आहे.  हें नाटक उत्तम गणलें गेलें आहे.  पण मला कांहीं तें पाहून आनंद झाला नाहीं.  नाटकगृहांत स्त्रियांची छानछोकी मात्र दिसली.  Box चे तिकिटाला ४ गिनी म्हणजे ८४ रु. पडतात.

Domestic Mission : रे. समर्स यांचें जॉर्जेस रोमधील मिशन पाहिलें.  ह्या भागांतील अत्यंत कंगाल लोकांची स्थिति चारपांच ठिकाणीं त्यांचें घरीं नेऊन आम्हांस रे. समर्स यांनीं दाखविली.  पैकीं तीन ठिकाणीं म्हातार्‍या स्त्रिया आजारी होत्या.  दोघां आजारी स्त्रियांजवळ मीं प्रार्थना केली. एक अगदीं बहिरी असल्यामुळें मला तिच्या कानाजवळ ओरडून प्रार्थना करावी लागली.  या बाईनें राजा राममोहन रॉयबद्दल मोठ्या आस्थेनें व आदरानें उल्लेख केला.  रस्त्यांत हिंडत असतां आमच्या मागें २००।२५० मुलांचा घोळका जमला होता.  कारण त्या वेळीं माझे डोक्यावर हिंदी साफा बांधलेला होता.  कांहींनीं आम्हांस थोडा त्रास दिला.  एकाशीं हस्तांदोलन करून समजून घातल्यावर सर्वांनींच तसें करण्याचा आग्रह धरला.  आम्ही घरांत शिरलों कीं, ही गर्दी आम्ही बाहेर येईपर्यंत वाट पाहात उभी असे.  हा त्रास चुकविण्यासाठीं समर्ससाहेबांनीं एक अशी युक्ति काढली कीं, एका घरांत गेल्यावर मागील दारानें आम्ही दुसर्‍या रस्त्यावर गेलों.  कामकरी बाया कामावर गेल्या असतां त्यांचीं मुलें सांभाळण्याची व्यवस्था एका घरांत केली होती.  एकंदर लहानमोठीं २३ मुलें होतीं.  प्रत्येक मुलास दोन पेन्स (२ आणे) प्रमाणें दर असे.  गरिबांचीं घरें कितीही कंगाल असलीं तरी त्यांत निदान १०।२० चित्रें, कांहीं मूर्ति, कांहीं दिखाऊ सटरफटर सामान होतेंच.  मिशनचें प्रार्थनामंदिर साधेंच पण पुरेसें होतें.  मिशनचा बहुतेक सर्व खर्च युनिटेरियन असोसिएशनमार्फत आहे.  अशीं तीन मिशनें लंडनच्या निरनिराळ्या भागांत आहेत.  अशींच मँचेस्टरसारख्या मोठमोठ्या शहरीं निरनिराळीं मिशनें आहेत.  अशीं मिशनें पाहून हिंदुस्थानांत परत गेल्यावर तेथील अस्पृश्य मानलेल्या लोकांसाठीं असेच प्रयत्‍न करावेत हा विचार मनांत आला.

Postal Mission (पोस्टल मिशन)  :  मिस् फ्लॉरेन्स हिलच्या आमंत्रणावरून युनिटेरियन पोस्टल मिशनच्या कौन्सिलमध्यें मुंबईच्या बाजूला ब्राह्मो पोस्टल मिशनची एक शाखा काढण्याचा माझा विचार मीं कौन्सिलपुढें ठेवला.  कमिटीला तो पसंत पडून त्यांनीं मला लागेल तशीं पुस्तकें पुरविण्याचें आश्वासन दिलें.  कमिटींत १०-१२ स्त्रिया होत्या.  युनिटेरियन वाङ्‌मय पोस्टामार्फत वांटून व पत्रव्यवहार करून प्रसार करण्याचें काम सर्व देशभर केवळ स्त्रियाच करतात.  पुढें माझे मित्र रा. वासुदेवराव सुकथनकर यांचेकडून मीं मुंबईस अशा एका ब्राह्मो पोस्टल मिशनची स्थापना करविली.

संडे स्कूल असोसिएशन :  चेअरमन मि. प्रिचर्ड यांचे घरीं जेवणास गेलों होतों.  जेवणानंतर मुलांसाठीं एक उपासना एका मंदिरांत झाली.  ती मिस् प्रिचर्ड हिनें चालविली.  मला दोन शब्द बोलावे लागले.  मुलांची वर्तणूक फार व्यवस्थेशीर होती.  सुमारें २०० मुलें होतीं.  २० वर्षांवरील सुमारें ७ तरुण मुलांचा एक वर्ग रविवारीं मिस्टर प्रिचर्ड स्वतः आपल्या घरीं घेत.  या गृहस्थांचा स्नेह पुढें त्यांचा अंत होईतों टिकला.

साउथप्लेस नैतिक समाज  :  इंग्लंडच्या साउथप्लेस नांवाच्या भागांत ह्या समाजाचें उपासनामंदिर आहे.  फ्रान्सच्या ऑगस्टकॉम यानें Positivism (निश्चितवाद) नांवाचा सांप्रदाय काढला.  या सांप्रदायांत ईश्वर, आत्मा वगैरे अज्ञेय गोष्टींना फाटा दिला आहे.  याला Humanism (मानव्यधर्म) असेंही नांव देतां येईल.  मोठमोठ्या थोर पुरुषांचे स्मृतिदिन पाळण्यांत येतात.  केवळ नीतीपलीकडे धर्म म्हणून कांहीं बंधनें नाहींत.  उपासनामंदिर व पद्धति इतर ख्रिस्ती देवळांतल्याप्रमाणें आहेत; पण परमेश्वर वगैरेचा इथें उल्लेख देखील होत नाहीं.  लोकांस जबरीनें लढाईवर पाठविणें हें निंद्य आहे, असें उपासकांनीं प्रतिपादलें.  ऍडम स्मिथ (अर्थशास्त्रज्ञ), सेज्विक (नीतिशास्त्रज्ञ) वगैरेंचे उतारे वाचले.  टेनिसनचीं कांहीं पदें गायिलीं.  सुमारें २०० श्रोते हजर होते.  हे बहुतेक अत्यंत उदार मताचे होते.  फ्रेडरिक हॅरिसन या नांवाचे गृहस्थ ह्या सांप्रदायाचे पुरस्कर्ते होते.  ही संस्था पाहून मोठा विस्मय वाटला.

ता. २९ डिसेंबर १९०२ रोजीं संध्याकाळीं ७ च्या गाडीनें ऑक्सफर्डला निघालों.  ९॥। वाजतां माझ्या बिर्‍हाडीं पोचलों.  मला फार दिवसांनीं घरीं आल्याप्रमाणें झालें.

पॅरिस  :  सुमारें १ वर्षभर मीं इंग्लंडांत घालवून इंग्रजी राहाटीची मला बरीच कल्पना आली होती.  इंग्लंड हा प्रॉटेस्टंट पंथाचा ऊर्फ सुधारलेल्या ख्रिस्ती धर्माचा देश.  फ्रान्स हा रोमन कॅथॉलिक पंथाचा, पोपच्या पंजाखालचा, जुन्या वळणाचा देश.  युरोपच्या दक्षिण भागांत तो असल्यानें आणि फ्रेंच लोक निराळ्या वंशाचे असल्यानें तेथील राहटींत साहजिकच बराच फरक असणार.  तो पाहण्यासाठीं मीं १९०३ सालच्या ईस्टरच्या सुटींत १ महिना फ्रान्समध्यें घालविण्याचा विचार केला.  हिंदुस्थानहून इंग्लंडला येतांना वाटेंत फ्रान्समधून खुष्कीच्या मागें मी आलों होतों; पण त्या वेळीं घाईच्या प्रवासांत मार्सेल्स, पॅरिस व कॅले यांची घाईंत फार अंधुक कल्पना आली होती.  ता. १४ मार्च १९०३ रोजीं सकाळीं ऑक्सफर्डहून पॅरिसला निघालों.  रात्रीं १०॥ वाजतां इंग्लंडच्या न्यु हेवन बंदरांत आलों.  समुद्र शांत व चांदणें असल्यानें प्रवास सुखाचा झाला.  इंग्लंडला येतांना हाच प्रवास वादळी हवेमुळें फार त्रासाचा झाला होता.  पॅरिसला सकाळीं ७ वाजतां पोचलों.

बॉने मोरी  :  पॅरिस युनिव्हर्सिटीच्या कांहीं विद्वान् पुढार्‍यांना व इतर उदार धर्मानुयायांना माझे गुरु डॉ. कार्पेन्टर यांचेकडून ओळखीचीं शिफारसपत्रें घेतलीं होतीं.  प्रथम बॉने मोरी या वृद्ध प्रोफेसरांस भेटलों.  हे डॉ. भांडारकरांसारखे किंचित् कडक व उग्र दिसले.  पॅरिसचें वरवरचें सौंदर्य पाहण्यासाठीं हुरळून आलेला मी एक तरुण असावा, असें वाटून त्यांनीं प्रथम माझी थोडी हजेरी घेतली.  पण ऑक्सफर्ड कॉलेजांतील ब्राह्मसमाजाचा एक प्रतिनिधि म्हणून कार्पेन्टरसाहेबांच्या शिफारसीचें एक पत्र पाहून स्वारीनें आपला शांत सल्ला दिला.  तुम्हांला पॅरिस खरें पाहायचें असल्यास येथील नटव्या इमारती पाहून न भुलतां त्यांच्या माळ्यावरील गाळ्यांत शिरून डोकावून पाहा.  तेथें कंगाल, चोरटे व गुंड लोक बिळांतल्या उंदरांप्रमाणें चोरून रात्रीं आश्रयास राहतात, त्याचीं कारणें शोधा, असें त्यांनीं बजावलें.

प्रो. रेव्हील  :  प्रो. जाँ रेव्हील यांचे संभाषणांतून अशी माहिती मिळाली कीं, प्रॉटेस्टंट लोकसंख्या फ्रान्सांत ६-७ लाख आहे.  प्रॉटेस्टंट समाजाच्या एका स्थानिक मंडळीस कनसिस्टार्स असें म्हणतात.  १०६ कनसिस्टार्सपैकीं ३३ सुधारक मताचे (युनिटेरियन) आहेत.  १७८९ पर्यंत प्रॉटेस्टंटांस धर्मस्वातंत्र्य मुळींच नव्हतें.  आतां कॅथालिक, प्रॉटेस्टंट व यहुदी अशा तिन्ही संघांस सरकारांतून सारखाच आश्रय मिळतो.  मदत देतांना सरकार मताची अट मुळींच घालीत नाहीं.  सुधारक संघाची एक त्रैवार्षिक सभा भरते.  तिचें नांव 'ऍसेम्ब्ली डी प्रॉतेस्तांत लिबरॉल' असें आहे.  ह्या सभेनें कमिटी निवडल्यावर तिच्या मार्फत सरकारांतून खर्च मिळतो.  पॅरिसचा समाज फार जुन्या मताचा आहे.  सोशॅलिस्टांची सामाजिक चळवळ फार जोरानें चालू आहे.  पण ह्या चळवळींतले सर्व सुधारक जरी हुशार आणि स्वार्थत्यागी आहेत, तरी धर्माच्या बाबतींत हे अत्यंत नास्तिक आहेत.  कारण कॅथॉलिक मताच्या जुलुमास कंटाळून सर्व धर्मांच्या विरुद्धच हे लोक बंडावले आहेत.  त्यामुळें एकीकडे कॅथॉलिक धर्माचा अडाणीपणा व जुलूम, दुसरीकडे सुधारकांच्या बुद्धीचा अंधपणा आणि औदासीम्य यांमध्यें उदार धर्माचें काम मोठें कठीण झालें आहे.  सोशॅलिस्ट लोकांचा कटाक्ष धर्म आणि भांडवल यांच्याविरुद्ध सारखाच आहे.

मोस्यू वेग्नेअर आणि रॉबर्ती ऑ. फॉतेनी हे उदार धर्माचे मोठे वजनदार वत्तेफ् आहेत.  'लॉ प्रोतेस्तंत' हें साप्‍ताहिक व 'लिबरल एव्हॅन्जलीक' हें मासिक हीं उदार मताचीं आहेत.  उदार धर्माच्या प्रसाराचें काम व्हावें तसें जोरानें चालू नाहीं.  धर्माच्या बाबतींत आतां बहुतेक पूर्ण स्वातंत्र्य आहे.  व्यक्तीच्याच स्वभावाची वाढ झाल्याशिवाय गत्यंतर नाहीं.  जाँ रेव्हील हे आधुनिक धर्माच्या इतिहासाचे पॅरिस युनिव्हर्सिटींत व्याख्याते आहेत.  व्याख्यानास सर्वांस मोंकळीक आहे.  तरी पण थोडास श्रोतृवर्ग हजर असतो.  पॅरिस येथें धर्माचें नांव काढल्यास कित्येकांस हंसें येतें.  वरपांगी जुन्या धर्माचें ढोंग माजविण्याचा हा परिणाम !

मोस्यु रोज  :  ता. २५ मार्च १९०३ रोजीं ७ वाजतां रात्रीं मोस्यु रोज यांचे घरीं जेवणास गेलों.  मादाम रोज ही फार गोड व कुशल बाई आहे.  ती इंग्रजी शिकत होती.  निदान तशी मोस्यु रोजची समजूत होती.  मीं कांहीं इंग्रजींत विचारलें कीं, मादामची कासावीस होई.  मग ती आतुर नजरेनें नवर्‍याकडे पाही.  त्याचें मला मोठें कौतुक वाटलें.  ३।४ वर्षांची मार्सेला ही मुलगी फार गोड होती.  मादामनें काढलेलीं कांहीं चित्रें पाहून समाधान वाटीलें.  मला पाहण्यासाठीं मादामचे आईबाप व बहीण ही मंडळी जेवणास आली होती.  फ्रेंच तरुणीस इंग्रजी तरुणीइतकी स्वतंत्रता नाहीं.  विवाह मुलीच्या संमतीनें आईबापच लावतात.  मुलींची विवाहमर्यादा कमींत कमी १६ वर्षांची असते.  अलीकडे १० वर्षांत स्त्रीशिक्षणाची अधिक सोय व प्रवृत्ति होत आहे.  स्त्रियांच्या प्रगतीच्या बाबतींत इंग्रजांचेंच येथें अनुकरण होत आहे.  इंग्रजांचा संसारी शहाणपणा फ्रेंच शिकतात व आपली छानी म्हणजे फॅशन त्यांना शिकवतात.  इंग्रजांपेक्षां फ्रेंच अधिक मोकळ्या मनाचे.  पॅरिसमध्यें गुलहौशी लोक घरीं न जेवतां रेस्तोराँ (Restaurant) मध्येंच जातात.

बॉई बॉला  :  ता.२८ शनिवार मार्च १९०३ रोजीं रात्रीं ८ वाजल्यावर माझ्या मित्रानें बॉई बाँला नांवाचें सार्वजनिक नाचाचें ठिकाण दाखविण्यास नेलें.  हें ठिकाण लॅटिन क्वॉर्टर्स नांवाचे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी राहातात त्या भागीं आहे, हें ऐकून ऑक्सफर्डहून गेलेल्या मला फार आश्चर्य वाटलें.  एक फ्रँक देऊन वाटेल त्यानें आंत करमणुकीसाठीं जावें.  व्हायोलिनवाल्यांचा मनोहर बँड येथें वेळोवेळीं सुरू होतो.  तेव्हां वाटेल त्यानें वाटेल तिच्याशीं नाचूं लागावें, क्रीडावें, हिंडावें, बोलावें, उपाहार घ्यावा किंवा संकेत करावा.  येथें येणार्‍या बहुतेकांबद्दल शंका येते.  किंबहुना अशा ठिकाणीं शंका घेणें म्हणजेच रिकामटेकडेपणा आहे.  पॅरिसच्या करमणुकी अशाच आहेत कीं, त्या परक्यांना सहसा सहन होत नाहींत.  निदान त्या कळत तरी नाहींत.  रंगेल स्त्रिया अगदीं उघड उघड येऊन विचारतात.  सुमारें १००० तरुण माणसें येथें विलास करीत बसलीं होतीं.  माझें मन विचारशील झालें.  हल्लींच्या उद्योगाच्या झटापटींत मनुष्याला कसल्या तरी करमणुकीची आवश्यकता आहेच.  धर्माधिकार्‍यांनीं जर शुद्ध करमणुकी पुरविल्या नाहींत तर इथल्याप्रमाणें केव्हां केव्हां अशुद्ध व घातकी करमणुकी समाजांत शिरतात.  इंग्लंडांत हल्लीं धर्माचे बाबतींत तरुणांचें लक्ष वेधण्याची खटपट करणारे मिशनी लोकांना शुद्ध करमणुकी पुरवीत आहेत; त्याचप्रमाणे तरुण कामकरीवर्गाचें मन धर्माकडे वळविण्याचाही प्रयत्‍न करीत आहेत.  याबाबत माझें मत पूर्वी फारसें अनुकूल नव्हतें.  ही सोकावलेली तरुण मंडळी करमणुकीला पुढें व धर्माला मागें होतात असें माझें म्हणणें होतें; पण अशा शुद्ध करमणुकी पुरवल्या नाहींत आणि कॅथॉलिक धर्माप्रमाणें फाजील सोवळेपणाचा दंभ माजविला पर पॅरिसांतल्यासारखे मासले दिसणारच, असें मला वाटू लागलें.

Read more: कांही टिपणें

इंटरमिजिएटचें वर्ष

उलटा प्रकार  :  माझ्या हायस्कूलच्या काळापेक्षां कॉलेजचा काळ फार निराळा गेला.  हायस्कुलांत गेल्यापासून आमच्या घरच्या सांपत्तिक परिस्थितीमुळें मला मोठी आपत्ति कशी भोगावी लागली ह्याचें वर्णन मीं केलेंच आहे; पण ही आपत्ति मी अजून लहान व मुग्ध असल्यामुळें मला तितकी जाणवली नाहीं.  ती माझ्या आई-बाबांस जाणविली.  मी त्यांच्या आश्रययाखालीं सुखांत (चैनींत) नाहीं तरी समाधानांत होतों.  जमखंडीसारख्या मागासलेल्या ठिकाणच्या मानानें माझा अभ्यास व हुषारी फार चांगली असल्यामुळें व मला स्कॉलरशिप मिळत असल्यामुळें मी आनंदांत असें.  आईबाबांच्या सहवासाशिवाय माझ्या भोंवतालच्या मित्रमंडळीच्या सहवासामुळें माझा हायस्कूलचा सर्व काळ अगदीं मजेचा गेला; पण कॉलेजचा सर्व प्रकार ह्याच्या उलट घडला.

गाढवी सवाष्णी  :  प्रीव्हियस परीक्षेंत मी पास झालों असें मला जमखंडीसच कळलें.  कॉलेजची परीक्षा पास झालेला पहिलाच विद्यार्थी ह्या नात्यानें जमखंडी गांवांत माझी ख्याति अधिकच पसरली.  पुण्यास परत येऊन मुंबई इलाख्यांतील प्रीव्हियसला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्यें माझा नंबर कितवा आला आहे हें जेव्हां मला कळलें तेव्हां माझी मोठी निराशा झाली.  माझा नंबर पहिल्या वर्गांत किंवा दुसर्‍या वर्गांत तर आलाच नव्हता, पण तिसर्‍या वर्गांतही फारसा वर नव्हता, हें पाहून जमखंडींतील माझी हुषारी म्हणजे खेडेगांवांत गाढवी सवाष्णी ही.  म्हण प्रत्ययास आणून देणारीच एक चीज झाली.  जमखंडी हायस्कूल म्हणजे एक क्षुद्र उंबराचें फळ.  त्यांत भरार्‍या मारणारा मी एक किडा.  मुंबई विश्वविद्यालयाच्या विस्तीर्ण उघड्यां अंगणांत आल्यावर माझें अल्पबळ मला कळून आलें !

ह्याशिवाय कॉलेजशिक्षणांत मी निस्तेज होण्याचीं दुसरींही अनेक कारणें होतीं.  माझ्या घरच्या गरिबीची जाणीव जी मला हायस्कुलांत घडली नाहीं ती पुण्यास मी एकटाच आईबापांपासून दर राहूं लागल्यामुळें मोठ्या तीव्रपणानें भासूं लागली.  शिवाय माझ्या लाजाळू स्वभावामुळें जमखंडींतलेच जे काय १।२ ओळखीचे सोबती होते, त्यांपलीकडे पुणेंकर विद्यार्थ्यांपैकीं कोणाशीं माझी मैत्री जमली नाहीं.  जनार्दनपंत करंदीकर, विश्वनाथ पोंक्षे आणि मी ह्या तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांपैकीं करंदीकर आणि मी दोघेच पास झालों.  

कंगाल स्थिति  :  फर्ग्युसन कॉलेजची त्या वेळेची स्थितीही माझ्या स्वतःच्या स्थितीप्रमाणें कंगालच होती.  वसतिगृह, क्रीडांगण वगैरे इतर उपकरणांचा व विद्यार्थ्यांनीं वरचेवर एकत्र जमण्याच्या प्रसंगांचा अभाव असल्यामुळें त्या वेळची आमची - निदान माझी तरी - स्थिति जंगलांत चुकलेल्या कोंकराप्रमाणें असह्य भासत होती.  अनेक कारणांमुळें कॉलेजच्या शिक्षणावर माझें प्रेम बसेना.  हायस्कुलांतली मनाची तरतरी, गुलहौस ही झपाट्यानें मावळूं लागली.  अशांत घरगुती संकटांनीं एकदम उचल खाल्ली आणि माझ्या सत्त्वाची चहूंकडून ह्या काळांत पारख चालली.  त्यांतून मी कसा निभावलों ह्याचें मला अद्यापि नुसतें आश्चर्य वाटतें; पण नीट मीमांसा कांहीं होत नाहीं.

जमखंडीचे यजमान श्री. आप्पासाहेब रामचंद्रराव यांनीं माझ्या वडिलांनाही नोकरीवरून कमी केलें.  त्यामुळें चहूंकडूनच आकाश फाटल्यासारखी स्थिति झाली.  पुण्यास माझा व जमखंडीस माझ्या घरचा योगक्षेम कसा चालला हें मला आतां कांहींच सांगतां येत नाहीं !

जनाक्काचा छळ  :  अशा कठीण स्थितींत आणखी एक संकट उद्‍भवलें.  माझ्या दोन लहान बहिणींपैकीं मोठी बहीण जनाक्का हिचा सासरी फार छळ होत होता.  तिची सासू मोठी खाष्ट बाई होती आणि नवरा फार अविचारी व उर्मट होता.  ह्या सासूचा व नवर्‍याचा छळ जनाक्काच्या सासर्‍याला प्रत्यक्ष आवडत नव्हता, पण त्याचें घरीं अशा बाबतींत चालत नसे.  जनाक्का चार इयत्तेपर्यंत लिहावयाला-वाचावयाला शिकली होती आणि तिचा नवरा केवळ अक्षरशत्रु होता, एवढेंच ह्या छळाचें कारण होतें.  घरीं पडेल तें सर्व काम एखाद्या मोलकरणीप्रमाणें जरी जनाक्का आपल्या लहान वयांत बिनबोभाट करीत असे, तरी तिच्या सासूला तें खपत नसे.  शेवटीं जनाक्काच्या नवर्‍याला बाहेरचा नाद लागून त्यानें घरीं एक द्वितीय संबंधाची बायको आणिली आणि जनाक्काच्या जिवाला अपाय घडण्याचे प्रसंग वरचेवर येऊं लागले.

गोष्ट येथवर आल्यानें मला ह्या प्रकरणांत हात घालावा लागला.  घरची गरिबी, माझ्या कॉलेजच्या खर्चाची ओढाताण, अशा स्थितींत जनाक्काची मी काय व्यवस्था करणार ?  पण त्या वेळीं माझ्या सुधारणेच्या मताला आणि सामान्यतः स्त्रीजातीसंबंधीं कारुण्यालाही पूर येत होता.  अशा वेळीं प्रत्यक्ष माझ्या बहिणीवर, तिची वागणूक इतकी पवित्र व स्वभाव सहनशील असूनही, असा प्रसंग आलेला पाहून मी बेफाम झालों.  मी त्या वेळीं मे महिन्याच्या सुटींत जमखंडीस आलों असेन.  माझ्या कानांवर जनाक्काच्या छळाची वार्ता पडल्याबरोबर मीं माझ्या आईबाबांना तिला एकदम आमचें घरीं आणावयाचा आग्रह केला.  आमचे बाबाही मानीच होते.  आम्हीं कोणींच ह्यापेक्षां मागचा पुढचा जास्त विचार न करतां,  आमच्या आलगूरच्या मामांना माझ्या बहिणीला आसंगीहून आमचे घरीं आणण्याला पाठवून दिलें.  त्यामुळें जनाक्काच्या सासूला व नवर्‍याला आयतेंच फावलें.  त्यांनीं जनाक्काचे सर्व दागिने काढून घेऊन नेसलेल्या एका फाटक्या लुगड्यांनिशीं तिला मामांबरोबर तात्काळ पाठविली.  त्यावर आम्हीं जनाक्काला अखेरपर्यंत आसंगीला कधींच पाठविलें नाहीं.  अगदीं लहानपणींच जनाक्का अशी आपल्या सासरला कायमचीच अंतरली आणि ती केवळ अविवाहित अशी आमचे घरीं राहिली.

ह्यापुढें कांहीं दिवसांनीं जनाक्काचा सासरा गोपाळराव हा तिला न्यावयाला आला; पण तिला सासरीं कोणत्याही प्रकारें सुख लागण्याची आशाच नव्हती.  उलट तिच्या जिवालाच अपाय घडण्याची भीति होती, म्हणून आम्हीं तिला पाठविली नाहीं.  गोपाळरावालाही विशेष आशा वाटत नव्हती; म्हणून तो बिचाराही जास्त आग्रह न करतां निमूटपणानें आल्या पावलींच परत गेला.  ह्या सर्व प्रकरणाला मीच कारण होतों, म्हणून जनाक्काच्या पुढच्या सर्व आयुष्याची जबाबदारी माझ्या कोवळ्या शिरावर पडली. हें किती प्रचंड ओझें मीं शिरावर घेतलें ह्याची मला त्या वेळीं कांहींच कल्पना नव्हती !  ह्या वेळीं माझी इंटरमिजिएट क्लासांतली एक टर्म संपली असावी; पण मला हा काळ नक्की कोणता हें आतां आठवत नाहीं.

बाळमित्र  :  प्रीव्हियस परीक्षा पास होऊन मी पुण्यास आल्यावर प्रथम नारायण पेठेंत मुंजाबाचे बोळासमोरील केळकरांचे वाड्यांत खोली घेतली होती.  एक खोली माझी आणि दुसरी कोल्हापूरचे रा. गोविंदराव शासने यांची असें जोडखोलीचें तें एक दालन होतें.  दुसरें विजापूरचे रा. गोविंदराव कलकेरी आणि कोल्हापूरचे रा. तळाशीकर ह्यांचे एक जोडखोलीचें दालन, अशा चार खोल्या आम्हां चौघांमध्यें होत्या.  अर्थात् मी ह्या वेळीं खोलीचें भाडें भरीत होतों; पण कसें तें मला सांगतां येत नाहीं.  रा.शासने ह्यांची ओळख नक्की कोठें व कशी झालीं हें मला आतां निश्चितपणें आठवत नाहीं; पण आरंभापासून अगदीं आतांपर्यंत टिकलेल्या अगदीं थोड्यां मित्रांपैकीं, म्हणजे चौघां मित्रांपैकीं ते एक आहेत.  तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे हे इंग्रजी ५।६ व्या इयत्तेपासून म्हणजे इ.स. १८९० पासून, प्रिन्सिपॉल केशव रामचंद्र कानिटकर हे प्रीव्हियस वर्गापासून म्हणजे इ.स. १८९३ पासून आणि गोविंदराव शासने इंटरमिजिएट वर्षापासून म्हणजे सन १८९४ पासूनच माझे मित्र आहेत.  पहिले देशस्थ, दुसरे कोकणस्थ ब्राह्मण आणि तिसरे मराठा जातीचे आहेत.  चौथे जनार्दनपंत करंदीकर हे तर माझ्या गांवचेच बाळमित्र आहेत.  ह्यांपेक्षां जास्त लहानपणापासूनचे मित्र किंवा अलीकडचेही कोणी विशेष म्हणण्यासारखे समान वयाचे मित्र मला नाहींत.

रा. शासने  :  शासने ह्या वेळीं पुणें नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नांवाच्या हायस्कुलांतील ७ व्या इयत्तेंतील विद्यार्थी होते.  ते वयानें माझेपेक्षा सुमारें वर्ष-सहा महिन्यांनीं मोठे असावेत.  हे दिलदार मनाचे मराठा मित्र लवकरच माझ्या घरांतल्या माणसाप्रमाणें मला जवळचे भासूं लागले.  'समानशीले व्यसनेषु सख्यम' ह्या न्यायानें आम्हा दोघांचा सहज जो स्नेहसंबंध जडला तो कायमचाच जडला.  माझा स्वभाव तापट तर त्यांचा किरकिर्‍या !  ह्या प्रकृतिदोषामुळें आमच्यांत नेहमीं कमीअधिक गोष्टींवरून वाद माजे व तो विकोपासही जाई; पण त्या मतभेदामुळें आमच्या स्नेहांत लवमात्रही बाधा येत नसे.  गोविंदरावांची घरगुती स्थिति माझ्याप्रमाणें तंग नव्हती.  त्यांचे वडील कोल्हापुरांतील एक घरंदाज फौजदार होते.  खाऊनपिऊन सुखी असें तें घराणें होतें.  माझीं उदार मतें व मोकळा स्वभाव यांवर लुब्ध होऊन गोविंदराव मजबरोबर राहूं लागले.  ते आणि आम्ही घरी अभ्यासांत भिन्न वर्गातले होतें, तरी परस्परांचा स्वाभाविक चांगुलपणा ओळखून होतों.

स्वयंपाकव्रत  :  ह्या वेळीं साहजिकपणें मला खर्चाचा फारच तुटवडा पडत असावा.  कारण खाणावळींत न जातां मी घरींच माझा स्वयंपाक कांहीं दिवस करून जेवत होतों आणि केवळ माझ्यासाठीं म्हणून गोविंदरावही माझेप्रमाणें स्वयंपाकी बनले असतील असें वाटतें; पण दुसर्‍या टर्ममध्यें परीक्षेचे दिवस जवळ येऊन अभ्यासाचा मारा जास्त पडल्यावर आम्हांला हें स्वयंपाकव्रत नाइलाजानें सोडावें लागलें.  मी किंवा गोविंदराव या कलेंत कधींच प्रवीण होण्यालायक नव्हतों.  भात आम्ही चांगला करीत असूं; पण गव्हाची पोळी मात्र खाण्यापेक्षां प्रदर्शनांत पाठविण्याच्या अधिक लायक होत असे.  त्यामुळें प्रकृतीवरही परिणाम होऊन हा नाद आम्हीं सोडला.

चैतन्यशून्यता  :  माझ्या हायस्कूलच्या काळच्या आठवणी लिहितांना माझे मित्र, खेळ, इतर छंद वगैरेंसंबंधीं मला बरेंच लिहितां आलें, तसें मला कॉलेजच्या काळासंबंधीं लिहितां येत नाहीं.  ह्याचें कारण हेंच कीं, दारिद्र्यामुळें व आईबापांच्या आश्रयापासून दूरच्या रहिवासामुळें माझ्या स्वभावांतला सहज आनंद बराच कमी झाला.  किंबहुना मला अकालीं पोक्तपणा व विचारीपणाही आला.  त्यामुळें माझा खेळकरपणा तर पार मावळलाच; पण मला इतरांशीं मैत्री जोडण्याची हौसही नाहींशी झाली.  फार काय पण कॉलेजच्या वर्गांतील ठरीव अभ्यासावरील मनही उडूं लागलें.  अभ्यास जुलमाच्या रामरामाप्रमाणें मला दुःसह झाला.  त्यामुळें फर्ग्युसन कॉलेजबद्दलच नव्हे, तर एकंदरींत तत्कालीन विश्वविद्यालयीन चैतन्यशून्य शिक्षणपद्धतीसंबंधीं विरक्ति आणि विमनस्कता माझ्यामध्यें वाढूं लागली.  जमखंडी हायस्कुलांत पहिला नंबर म्हणून मिरविलेला मी फर्ग्युसन कॉलेजमध्यें कोठल्या कोनाकोपर्‍यांत बेपत्ता विद्यार्थी होऊन राहिल्याची मला मनांत टोंचणी लागली.  अभ्यासाची हयगय चाललेली माझ्या लक्षांतच येईना !

बौद्धिक विकास  :  ठराविक अभ्यासाची वर सांगितल्याप्रमाणें अवस्था झाली तरी माझ्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला अशांतला मुळींच प्रकार नव्हता.  तें कधीं शक्यच नव्हतें.  ह्याहीपेक्षां भयंकर आपत्ति मजवर पुढील आयुष्यांत किती तरी कोसळल्या, तरी माझ्या मनाची अंतर्वाढ थांबणें शक्यच नव्हतें.  सहज आनंद हा माझ्या मनोरचनेचा पायाच आहे, असें आतां मला दिसूं लागलें आहे.  माझ्या आनंदाला, शांतीला, समाधानाला-अतएव अंतर्विकासाला बाह्य उपाधीची मदत झाली नाहीं किंबहुना विरोधही झाला नाहीं.

सोबती, खेळ, बाह्य सुखसोयी वगैरेंची बाजू लंगडी पडली, तरी माझें खासगी वाचन त्या काळच्या मानानें बरेंच चाललें होतें.  जमखंडीसारख्या गांवढ्या गांवांतल्या हायस्कुलांत पुस्तकालयाची उणीव होती तितकी व तशी फर्ग्युसनसारख्या नवीन चालू झालेल्या का होईना, पण कॉलेजांत असणें शक्य नव्हतें.  प्रीव्हियस वर्गांत असतांनाच मला जॉन स्टुअर्ट मिल्लसारख्या तत्त्वज्ञान्याचा आणि मेकॉलेसारख्या ऐतिहासिक निबंधकाराचा परिचय घडला.  Liberty (स्वातंत्र्य), Utilitarianism (उपयोगवाद, बहुजनहितवाद),  Subjection of Women (स्त्रियांची गुलामगिरी) वगैरे मिल्लचे प्रासादिक ग्रंथ मूळ इंग्रजींत वाचून कानांत वारें शिरलेल्या वासराप्रमाणें माझी स्थिति प्रीव्हियसमध्येंच झाली होती !  इंटरमिजिएटमध्यें आल्यावर हर्बर्ट स्पेन्सरच्या Education (शिक्षण), Introduction of the Study of Sociology (समाजशास्त्राच्या अध्ययनाचा परिचय) ह्या इंग्रजींतील मूळ ग्रंथांचे वाचन झाले.  त्या वेळीं स्पेन्सरची चलती युरोप-अमेरिकेंतच नवहे तर हिंदुस्थान व जपान ह्या पौर्वात्य देशांतही फार वैभवशाली आणि विजयी झाली होती.  त्या काळचे कॉलेजांतले बहुतेक शिक्षक स्पेन्सरच्या अज्ञेयवादानें जवळजवळ झ्पाटल्याप्रमाणेंच झाले होते.  दाभोळकर नांवाच्या एका गृहस्थांनीं तत्कालीन तरुण विद्वान् गृहस्थांकडून स्पेन्सरच्या बर्‍याच ग्रंथांची भाषांतरमाला प्रसिद्ध करण्याचें काम नेटानें चालविलें होतें.  त्यांपैकीं बरींच पुस्तकें मी हावर्‍यासारखीं वाचीत असें.

नास्तिकपणा  :   जेथें आमचे गुरुच त्या नवीन विचारानें असे हैराण झालेले, मग माझ्यासारख्या उतावळ्या विद्यार्थ्याची अत्यवस्था झाली, असें म्हणावयाला काय हरकत आहे ?  पुस्तकें जरी मीं म्हणण्यासारखीं पुष्कळशीं वाचलीं नसलीं तरी जीं तात्त्वि महत्त्वाची वाचलीं त्यांचा माझ्यामध्यें फार जोराचा अभिनिवेश घडला.  थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे जमखंडींतल्या आमच्या वाड्यांतल्या अंधेर्‍या देवघरांत बसून श्रीशिवलीलामृताचें पारायण करीत शिवलिंगावर श्रावणी सोमवारीं सहस्त्रदळें वाहिल्याशिवाय तोंडांत पाणी न घेणारा मी पुण्यांत आल्यावर आगरकरांचे लेख आणि मिल्ल-स्पेन्सरचे प्रत्यक्ष ग्रंथ वाचून पुण्यांतल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठया नास्तिक बनलों !

चर्चामंडळ  :  मी नुसतें वाचून स्वस्थ बसणारा युवक नव्हतों.  जें आपल्या मनांत आलें तें दुसर्‍याजवळ बोलून त्यावर चर्चा करावयाची प्रवृत्ति किंबहुना खोड माझ्यामध्यें आनुवंशिकच होती.  माझ्या वडिलांप्रमाणेंच मलाही बोलावयाला फार आवडतें.  मात्र लाजाळूपणाचा दाब असल्यामुळें अपरिचिताजवळ किंवा अप्रासंगिकपणें वाकतांडव करण्याचें मात्र मला कधीं धैय होत नसे.  तथापि पोटांत घटकाभर विष आवरेल, पण नवीन विचार अगर एखादा सुंदर अनुभव मनाला घडला, कीं कोणा तरी सहानुभूतीच्या मित्राजवळ किंवा आताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे.  ह्यामुळें केळकरांच्या वाड्यांत असतांना माझ्या नेतृत्वाखालीं आमच्या खोलींत एक छोटेखानी Debating Union (चर्चामंडळ) स्थापन करण्यांत आलें होतें.  त्यांत माझाच सुळसुळाट जास्त असावयाचा.  ह्या लहानशा मंडळांत नवीन भेटलेल्या मिल्ल-स्पेन्सरच्या विचारांची पुनरावृत्ति करण्यांत मी मोठें वक्तृत्व पाजळीत असें.  ह्या वत्तृफ्त्वाची संवय आमच्या जमखंडींतील वसंत व्याख्यानमालेंतल्या माझ्या ढुढ्ढाचार्यपणावरून मला लागत चालली होती.  विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, विकासवाद, स्त्रीदाक्षिण्य इ. मोठमोठ्या अवजड विषयांवर लहान तोंडीं मोठा घास घेण्याचें मला जमखंडींतल्या वसंत व्याख्यानमालेंतच अगवळणीं पडलें होतें.  मग पुण्यासारख्या वाचाळ आणि मुंबईसारख्या चवचाल शहरांचा संपर्क घडल्यावर आणि विशेषतः मिल्ल-स्पेन्सरच्या तत्कालीन वेदतुल्य नवीन विचारांच्या ज्ञानलवांनीं दुर्विदग्ध झाल्यावर माझें डोकें ताळ्यावर राहणें कठीण झालें.  मंडळांतील सभांतून नव्हे तर विद्यार्थ्यांशीं खासगी संभाषणांत मी त्यांना माझा नवीन तुटपुंजा नास्तिकपणा शिकवूं लागलों.  त्या वेळीं मीं एक लहानसा निबंध इंग्रजींत लिहिला होता.  त्यांत 'देवानें माणसाला निर्माण केलें नसून उलट माणसानेंच देवाला निर्माण केलें' हें अर्धवट सत्य मीं मोठ्या उत्साहानें प्रतिपादिलें होतें, हें पण आतां नीट आठवतें !  तें कसेंही असो, कोणीं कोणाला निर्माण केलें हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालणारा आहे; पण इतर अनेक कारणांत माझ्या विक्षिप्‍त खाजगी वाचनाची आणि वादविवादांची भर पडून ठराविक अभ्यासाची आबाळ झाली.  अर्थात् मला इंटरमिजिएट परीक्षेंत अपयश आलें !  जमखंडी हायसकुलांतील पहिला नंबर विश्वविद्यालयांत बराच खालीं घसरतो; इतकेंच नव्हे तर उगीच घमेंड मारील तर चांगली आपटीही कसा खातो, हें माझ्या प्रत्यक्ष अनुभवास आलें.  विशेष हा कीं, ज्या  (Logic) तर्कशास्त्र ह्या विषयांत माझा विशेष तोरा चालत असे त्यांतच मी नापास झालों हें पाहून 'ज्वर इव मदो मे व्यपगतः' हा भर्तृहरीचा टोमणा मला चांगलाच जाणवला !  

पशुपणा :  परीक्षेंत नापास होण्याचा अनुभव मला आतांपर्यंत मुळींच नव्हता.  तो आला हें एका परीनें बरेंच झालें.  वाईट वाटणें साहजिकच होतें; पण अगदीं धक्का असा बसला नाहीं.  मात्र विश्वविद्यालयीन परीक्षांविषयीं आदर कमी कमी होऊं लागला.  ह्या परीक्षेच्या चरकांत तरुण विद्यार्थ्याचें रक्त कसें पिळून निघतें आणि इतक्या रक्ताच्या आहुत्या ओतूनही शेवटीं अवयशाचा टिळा लागला म्हणजे विद्यार्थ्याचें कंबरडेंच कसें मोडतें हें कळलें !  कंबरडें मोडल्यावरही पुन्हां जो कॉलेजची वाट धरितो तो ''स वै मुक्तोऽथवा पशुः'' ह्या वचनाप्रमाणें मुक्त किंवा पशु असावा.  मी मुक्त नसल्यामुळें पशुपणा पदरीं घेऊन इ.स. १८९५ चे जानेवारींत हातांत नाक धरून जमखंडीहून पुन्हां कॉलेजच्या अभ्यासासाठीं पुण्याला निघालों !

कडेवाला त्रिम  :  इ.स. १८९४ सालीं आम्ही नारायण पेठेंत केळकरांच्या वाड्यांत असतांना सदाशिव पेठेंतील प्रसिद्ध हौदावर रोज सकाळीं स्नानास जात असूं.  त्याच हौदाला लागून पूर्वेस करमरकरांचा (नांव पक्कें आठवत नाहीं) वाडा आहे.  त्यांत एक ब्राह्मणाची खाणावळ होती.  तेथें मी आणि गोविंदराव जेवावयास जात असूं.  इ.स. १८९५ च्या वर्षारंभीं मी पुन्हां पुण्यास आल्यावर पहिल्या टर्ममध्यें ह्याच वाड्यांतील दुसर्‍या मजल्यावर आम्हीं बिर्‍हाडासाठीं एक खोली भाड्यांनें घेतलीं.  तिच्यांत गोविंदराव, त्यांचे कोल्हापुराकडचे कुलकर्णी नांवाचे एक स्नेही, जनुभाऊ करंदीकर आणि मी इतकेजण मिळून राहात होतों.  तेथें देखील कांहीं दिवस आमच्या चर्चामंडळाच्या कांहीं सभा झाल्या.  रा. कुलकर्णी आणि जनुभाऊ हे दोघे अगदीं जुन्या मताचे आणि गोविंदराव व मी तितकेच नव्या मताचे असल्यामुळें ह्या पहिल्या टर्मभर अभ्यासापेक्षां आमचा वादविवादच फार झाला आणि तो अगदीं जोरजारानें पुष्कळ वेळ चालत असे.  कुलकर्णी हे घरचे श्रीमंत होते.  नेसावयाला रेशीमकांठी धोतर आणि डाव्या हातांत एक भलें मोठें सोन्याचें कडें ते नेहमीं घालीत असत.  त्यांच्या जुन्या राहटीचीं हीं झगझगीत चिन्हेंच होतीं.  आम्ही त्यांना नेहमीं कडेवाला कुलकर्णी म्हणत असूं.  ते बोलतांना किंचित् तोतरे बोलत असत आणि वादांत चिडत असल्यामुळें त्यांच्या तोतरेपणाला मोठी बहारीची लज्जत येत असे !  स्नानसंध्या, सूर्याला नमस्कार, धोतराच्या चापून निर्‍या, सुंदर चेहरा, पाणीदार डोळे, गोरा रंग आणि हातांतलें बावनकशी सोन्याचें भव्य कडें - एकंदरींत नमुना कांहीं औरच होता.  अभ्यासाची प्रगति मात्र ह्या सर्वांच्या उलट दिशेनें धांव घेत होती !  ह्यांच्या सहवासांत ही पहिली टर्म हसतखेळत मजेंत गेली.  डेक्कन मराठा असोसिएशनची माझी दरमहा १० रु. ची स्कॉलरशिप चालूच होती, हें निराळें सांगणें नकोच.

Read more: इंटरमिजिएटचें वर्ष
  1. आयुष्यांतील परिवर्तनें
  2. आमचीं लग्नें
  3. आदरांजलि
  4. आजोळ
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
Page 48 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी