1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

प्रांतिक सामाजिक परिषद, सातारा

या परिषदेचें अध्यक्षस्थान देऊन आपण जो माझा बहुमान केला त्याबद्दल मी जरी आपला फार आभारी असलों तरी या मानाकरितां स्वभावप्रवृत्तीमुळें मी अयोग्य व असमर्थ असतांहि आपण त्याकरितां माझीच निवड कां करावी असा प्रश्न माझ्यापुढें उभा राहिल्याशिवाय राहात नाहीं. मी विद्वान नाहीं किंवा व्यवहारांत मोठा धूर्तहि नाहीं, यामुळें राष्ट्रोद्धाराच्या कार्यांतील गाजावाजा न करतां येण्यासारखा जो भाग, म्हणजे ब्राह्मसमाजाच्या मतांचा पुरस्कार व अस्पृश्य वर्गाची सेवा, तोच मीं स्वीकारला आहें. हल्लीं अस्पृश्योद्धाराबद्दल जरी पुष्कळ गाजावाजा केला जात असला तरी या कार्याची खरी कळ राष्ट्राच्या अंतःकरणास जाऊन झोंबलेली नाहीं असें म्हणणें मला भाग आहे. यामुळें आपण माझ्यापेक्षां अधिक लोकप्रिय व अर्थात अधिक वजनदार अशा पुढा-यास हा मान दिला असता तर बरें झालें असते. आपली सूचना मला फार उशीरां व अत्यंत अनपेक्षित रीतीनें आली; व ती विनंति नसून सत्कार्याप्रीत्यर्थ करण्यांत आलेली आज्ञा आहे, आणि जर मीं ती नाकारली तर माझ्या हातून कर्तव्यच्युति होईल असें मला वाटलें. हें अध्यक्षपद स्वीकारण्यांत माझ्याकडून जो अतिक्रम झाला आहे त्याबद्दल यांकडे पाहून आपण क्षमा करावी अशी माझी विनंति आहे.

पूर्वपीठिका

हाल नांवाच्या शातवाहन कवीनें जुळविलेल्या “गाथा-सप्तशती” नांवाच्या प्राकृत काव्यसंग्रहांतील ताल ३ –या शतकांतील ८५ वा श्लोक असा आहे.
पोट्टं भरन्ति सडणावि माडआ अप्पणो अणुव्विगा विहलुद्धरण सहावा हुवन्ति जह केवि सप्पुरिता ||८५|| मराठींत अर्थ - पोटभरति पक्षी ही माई आपण अनुद्विग्न | विव्हलोद्धरण स्वभाव होती जरी कांहीं सत्पुरष ||८५||
ह्यावरून ख्रिस्ती शकाच्या सुमारें दुस-या शकांतील महाराष्ट्री वाङ्मयाच्या भाषेशीं जुन्या व नव्या मराठीचा कसा काय संबंध लागतो ह्याची किंचित् ओझरती कल्पना येण्यासारखी आहे. अनेक प्राकृत भाषाकोविद जैन आचार्य मुनी विजयजी हे एकदां असे म्हणाले कीं, ज्ञानेश्वरीची मराठी भाषा ही प्राकृत जाणणाराला जशी व जितकी दुर्बोध वाटते तशी व तितकीच दुर्बोध हल्लींची मराठी जाणणारालाहि वाटते. ह्याचा अर्थ असा कीं, ज्ञानेश्वरी मराठी ही पूर्वींच्या प्राकृताहून जितकी अलीकडची तितकीच हल्लींच्या मराठीहून पलीकडची आहे. पण येवढ्यावरूनच ती दुर्बोध कां व्हावी? हिंदी, गुजराथी व बंगाली ह्या अर्वाचीन भाषांचा जुन्या प्राकृताशीं जितका संबंध जुळतो तितका मराठीचा कां जुळत नाहीं? त्याचें कारण मराठी ही कानडीचे मागून व तिच्या तालमींत किंबहुना सासुरवासांत वाढलेली भाषा आहे, म्हणून कानडीचा तिच्यावर जबर परिणाम झाला आहे. यदाकदाचित् वैदिक भाषेशीं मराठीचा संबंध असेलच तर तो कानडी भाषेचा मूळ द्राविडी भाषेशीं जितका दूरचा संबंध आहे त्याहून अधिक दूरचा असावा. तामिळपासून कानडी जितकी दूर आहे त्यापेक्षां शब्दकोशाच्या दृष्टीनें नसली तरी व्याकरणाच्या दृष्टीनें मराठी हीं संस्कृतापासून जास्त दूर आहे. दूरीभाव डोळ्यांत न भरण्याचें कारण असें कीं, आधुनिक मराठींत संस्कृत व तत्सम शब्दांचा भरणा फार होऊं लागल्यामुळें मराठीं वस्तुतः आहे त्यापेक्षां संस्कृतच्यां जवळ असल्याचा भास होतो.
ज्ञानेश्वरीच्या मराठीचा उद्य होऊं लागण्यापूर्वीं बरींच शतकें कानडींतील लिखित वाङ्मयाची भरभराट होऊन चुकली होती. शके बाराशेंच्या पूर्वीं मराठीच्या वाङ्मयाचाच नव्हे तर शिलालेखांचाहि लागावा तितका पत्ता अद्यापि लागत नाहीं. पण कानडीचा इतिहास ह्याहून अगदीं निराळा आहे. ता. २३ जुलै सन ६१३ च्या एक शिलालेखांत रविकीर्ति नांवाच्या एका जैनधर्मी कानडी कवीचा उल्लेख आहे तो भारवि आणि कालिदास ह्यांच्या तोडीचा होता असें त्याचें म्हणणें आहे. राष्ट्रकूट वंशांतील पहिला अमोघ वर्ण ऊर्फ नृपतुंग अथवा शव ह्या राजाचे नांवावर ‘कविराजमार्ग’ नांवाचा अलंकरशास्त्रावरील एक कानडी ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचा काळ शके ७७५-७९९ चे दरम्यान आहे. ह्या पूर्वींच्या ब-याच ग्रंथांचे उल्लेख शिलालेखांतून मिळतात. पण ते ग्रंथ मात्र अद्यापि उपलब्ध नाहींत. ह्यानंतर १|२ शतकांनीं पंप आणि पोन्न हे कानडी कवि उद्यास आले. पंपाचे आदिपुराण, रामायण, भारत इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. केवळ लिखित व अभिजात वाङ्मयाच्या भाषेचा कानडीला हा मोठेपणाचा मान आहे असें नव्हे, तर विस्ताराच्या दृष्टीनेंहि हल्लींपेक्षां मध्ययुगीन कानडीचा मराठीहून अधिक मोठ्या प्रदेशावर विस्तार होता. “आकावेरियिंद आ गोदावरी वरे गम” म्हणजे कावेरीपासून गोदावरीपर्यंत कानडीचें साम्राज्य पसरलें होतें. आणि त्यांतल्या त्यांत वक्लंद (बेळगांव) आणि कोप्पळ ह्यांचेमधील प्रदेशांत तर अत्युत्कृष्ट अशा कानडीचा प्रचार होता अशा अर्थाचा उल्लेख “कविराजमार्ग” ह्या ग्रंथांत आहे असे प्रो. पाठक यांचें म्हणणें आहे. देवगिरीच्या यादव-घराण्यांतील १२ व्या शतकांतल्या महादेव राजापर्यंत तरी कानडीच्या ह्या अवाढव्य प्रसाराला ओहोटी लागल्याचीं चिन्हे दिसत नाहींत. तोंपर्यंत महाराष्ट्राच्या निरनिराळ्या सम्राटांच्या राजधान्या खालीं कर्नाटकांतच बनवासी, बदामी, धनकटक, मालखेड इत्यादि दक्षिणेकडील शहरांत असल्यामुळें अर्थातच अभिजात मराठीच्या प्रसाराला गोदावरीच्या दक्षिणेकडे वावच मिळाला नाही. पण देवगिरीच्या यादवांच्या प्रतापामुळें महाराष्ट्राच्या राजकारणानेंच नव्हे तर वाङ्मयानेंदेखील जो अपूर्व उठाव केला आणि विशेषतः कानडीला दक्षिणेकडे रेटण्याची जी सुरुवात केली तिचा प्रभाव अद्यापि जाणवत आहे. मात्र आतां हा प्रसार बंद पडून लवकरच मराठीला मागें हटावें लागेल असें सेन्सस रिपोर्टाच्या आंकड्यांवरून दिसूं लागलें आहे.

पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना झाल्यावर मला आपल्या ब्राह्म समाजाच्या सफरीवर बंगाल्यांत सन १९०८ चे सुमारास एकदां जावें लागलें. अर्थात मला तेथें ठिकठिकाणीं “अस्पृश्यांच्या” आपत्तीबद्दल व्याख्यानें द्यावीं लागलीं. तेथील ब्राह्म समाजांतील कांहीं सभासदांनीं लगेच इकडील आपल्या मिशनच्या धर्तीवर तिकडे शाळा काढल्या. प्रथम प्रथम ह्या कामाचा आमच्या मिशनचा संबंध होता. पण तिकडील कार्याचा अंतर्भाव लवकरच ब्राह्म समाजाच्या इतर सामाजिक कामांत करावा लागला; त्यामुळें आमच्या ह्या अखिल भारतीय मंडळाशीं त्या कामाचा दप्तरी संबंध आम्हांला तोडावा लागला. तरी पण मी जेव्हां जेव्हां बंगाल्यांत जाई तेव्हां तेव्हां तें काम मुद्दाम पाहून येई. इ. स. १९२३ सालीं मी बंगाल्यांत गेल्यावेळीं जेसोर आणि खुलना जिल्ह्यांतील आमच्या कांहीं हायस्कुलांत राहून तीं नीट तपासून आलों होतों. गेल्या वर्षीं ऑगस्ट महिन्यांत साधारण ब्राह्म समाजानें ‘ब्राह्म समाज हिदुस्थानांत स्थापन होऊन १०० वर्षें पूर्ण झालीं’ म्हणून बंगाल्यांत विशेषतः कलकत्त्यांत एक अपूर्व महोत्सव केला. त्या निमित्तानें पूर्व आणि उत्तर बंगाल्यांत एक मोठें प्रचारक दळ काढण्यांत आलें होतें. तें काम मजकडे आलें म्हणून मी विशेषतः ज्या खेड्यांतून “नामशूद्र” नांवाच्या अस्पृश्य वर्गाच्या शाळा व इतर प्रागतिक कामें चाललीं होतीं तेथें हें दळ नेलें. त्या वेळीं आज सुमारें २० वर्षें चाललेल्या ह्या शिक्षणविषयक कामाची प्रगति झाली आहे, हें मला प्रत्यक्ष पाहावयास मिळालें.
मुंबईकडील आणि बंगालकडील कामांत हा एक विशेष फरक आहे कीं, मुंबईकडे आमचीं सर्व कामें ह्या मिशनकडूनच प्रत्यक्ष होतात. पुणें शाखेंतच मात्र कमिटींत व प्रत्यक्ष काम करणारांत “अस्पृश्य” वर्गाच्या सभासदांची बहुसंख्या आहे. अलीकडे तर त्यांचीच सत्ताहि चालू आहे. तरी अद्यापि इकडील मिशनमध्यें प्रत्यक्ष “अस्पृश्य” वर्गाच्या होतकरू पुढा-यांनीं म्हणण्यासारखें लक्ष पोंचविलेलें किंवा अंग मोडून काम करीत असल्याचें दिसत नाहीं. बंगाल्यांत उलटा प्रकार आढळतो. पूर्वींपासूनच तिकडील सर्व शाळा आणि इतर कामें “अस्पृश्य” वर्गांनींच काढल्या व चालविलेल्या आणि ब्राह्म समाजानें त्यांना तसें करण्यास प्रेरणा व साह्य केलें. ह्या फरकाचें कारण हेंच कीं, तिकडील नामशूद्रांची स्थिति इकडील मांगांहून पुष्कळच उच्च दर्जाची पूर्वींपासूनच होती. डोम, पोड, होरी वगैरे इतर खरोखरीच अवनत वर्गांची स्थिति नामशूद्रांपेक्षांच नव्हे तर आमच्या महारमांगांहून अद्यापि किती तरी अधिक खालावलेली आहे. दक्षिण हिंदुस्थानांत बिल्लव, तिय्या, एजवा नांवांच्या अस्पृश्यांची स्थिति ज्याप्रमाणें इतर ‘अस्पृश्यांहून’ पुष्कळ सुधारलेली आहे, त्याचप्रमाणें बंगालच्या नामशूद्रांचा प्रकार आहे. दक्षिणेंत बिल्लव, तिय्या वगैरे परय्या, चिरुमा वगैरेंना जसें अद्यापि शिवून घेत नाहींत व इतर वरिष्ठ वर्गांप्रमाणेंच ह्या गरिबांना निर्दयपणानेंच वागवितात, त्याचप्रमाणें नामशूद्रहि हा भेद पाळतात. फार काय आम्हीं मुंबई इलाख्यांत जेव्हां प्रथम कामाला सुरुवात केली, तेव्हां चांभार, ढोर, वगैरेंनीं स्वतः वरिष्ठ समजून आमच्या मिशनचा फायदा घेण्यास बरेच आढेवेढे घेतले. बहुतेक महारच शाळांतून व बोर्डिंगांतून येत. आणि तेहि मांग, भंगी ह्यांच्याशीं समानतेनें वागण्यास कां कूं करीत. अजून तरी मिशनकडे सर्व ‘अस्पृश्यांचें’ पूर्ण लक्ष न लागण्याच्या अनेक कारणांपैकीं, ह्या अस्पृश्य वर्गांतील आपसांतील जातिभेदच एक मुख्य कारण आहे, हें मिशनबाहेर राहून नीट ध्यानांत धरणें शक्य नाहीं. असो.
हा प्रांतिक जातिभेदाचा फरक कसाहि असो, बंगाल्यांत विशेषतः पूर्व बंगाल्यांत आज नामशूद्रांच्या उच्च शिक्षणाची जी झपाट्यानें प्रगति चालली आहे, त्याचीं दुसरीं कारणें म्हणजे बंगाल प्रांताचें शिक्षण खातें व कलकत्ता युनिव्हर्सिंटीचें लोकसत्तावादी धोरण हीं दोन मुख्य होत. शिक्षणाचे दृष्टीनें, मग तें प्राथमिक असो वा उच्च असो, बंगाल आणि मद्रास हे दोन्ही प्रांत मुंबईच्या किती तरी पुढें आहेत. त्यांतल्या त्यांत मुंबई युनिव्हर्सिटी ही स्त्री शूद्रांच्या बाबतींत तरी फार ओढग्रस्त आणि मागासलेली आहे. उच्च शिक्षण महाग आणि दुर्मिळ करण्यांत तिचा हातखंडा ! अस्पृश्यांना व स्त्रियांनाच काय पण जंगली जाती, गुन्हेगार जाती, किंबहुना आंधळे, बहिरे, मुके ह्यांनाहि ब्राह्मणादिक कुशाग्र बुद्धीच्या पुरुषाबरोबर एकाच जात्यांत भरडण्याची ह्या युनिव्हर्सिटीला खोड लागली आहे. ती जाईपर्यंत “अस्पृश्यांचीं” निराळीं हायस्कुलें इकडे निघणें शक्य नाहीं.
मद्रासमध्यें स्त्रियांकरितां वेगळीं कॉलेजें आहेत. कांहीं तर स्त्रियांनींच चालविलीं आहेत. मद्रासेकडे पडदा नाहीं, तसेंच बंगल्यांत जातिभेद तीव्र नाहीं. पूर्वीं बौद्ध धर्म आणि आतां वैष्णव, व अलीकडे ब्राह्म समाजाचा जोराचा परिणाम तेथें झाला असल्यामुळें दक्षिणेकडील भयानक अस्पृश्यतेच्या गोष्टी बंगाल्यांतील नामशूद्रांनाहि अरेबिअन नाइटसप्रमाणेंच सहज विश्वासार्ह वाटत नाहींत. अशा अनेक कारणांमुळें, विशेषतः पूर्व बंगाल्यांतील नामशूद्रांनीं, आतां शिक्षणांतच नव्हे तर इतर बाबतींतहि आपलें पाऊल सारखें पुढें चालविलें आहे. तशांत नामशूद्र हाच तिकडील कुणबी वर्ग मुसलमानांच्या पूर्वीं आणि मुसलमान रिआसतींतहि त्यांची लष्करांत फार भरती होत असे. आतांहि हिंदु-मुसलमानांच्या मारामारींत नेभळे आणि चळवळे हे दोन्ही प्रकारचे बंगाली नामशूद्रांनाच शरण येतात. मुसलमान तर ह्यांच्या कधींच वाटेला जात नाहींत. हे नामशूद्र थोड्याच शतकांपूर्वीं बौद्ध क्षत्रिय होते. ही सर्व पूर्वपीठिका आठविल्यास खालील कोष्टकांतील आंकडे पाहून आश्चर्य वाटण्याचें कारण उरणार नाहीं.

पूर्व बंगाल्यांतील नामशूद्रांचें उच्च शिक्षण [हायस्कूल]
( PDF साठी येथे क्लिक करा)

 

ह्या आंकड्यांत मुलींची संख्या दिलेली नाहीं. शिवाय सचिदाहा शाळेंत फ्री बोर्डिंग ४० मुलांचें आहे, तसें सर्वत्र नसलें तरी ह्या सर्व खेड्यांतून जेवण व राहण्याची सोय जवळच असते. ह्या तेरा हायस्कुलांची माहिती केवळ पूर्व बंगाल्यांतील चार जिल्ह्यांतील आहे. ह्याहून अधिक शाळा व मिडल स्कूल्स किती तरी आहेत. हीं सर्व निव्वळ नामशूद्रांनीं आपल्या हिमतीवरच चालविलीं आहेत ! पैकीं चार ठिकाणीं तर मी स्वतः जाऊन राहिलों आहे. अर्थात् यांना आमच्याकडे ‘हाय स्कूलें’ म्हणजे उंच शाळा कोणीच म्हणणार नाही. पत्र्यांची वावरांतून एक पडळ बांधली आणि सुमारें शंभर मुलें जमविलीं कीं झाली हायस्कूलची तयारी ! ३० पासून ६०-७० पर्यंत पगारावर ८-१० मास्तर स्वजातीयांतून सहज मिळतात. त्यांत तीन चार तरी ग्रॅज्युएट असतातच. एलएल. बी. चा अभ्यास करणारा एखादा पोक्त अनुभवी हेडमास्तर होतो. आसपासचीं ५-१० खेड्यांतून अर्धवट इंग्रजी शिकलेलीं मुलें जमतात. कोणी जागा, कोणी पत्रा, कोणी लांकडें, कोणी ढेकळें देऊन कमिटीचे सभासद होतात. सल्लामसलत, पैशाची जुजबी मदत आणि देखरेख करण्यास ब्राह्म समाज तयार आहेच. मॅट्रिकची परीक्षा पास झाली कां, त्याला प्रवेश द्यावा; ह्यापेक्षां युनिव्हर्सिटी अगर विद्याखातें उगीच त्यांच्या मागें कांहीं भगभग लावीत नाहीं. आमचेकडे हायस्कूल म्हटलें कीं, निदान एक लाखाची काळ्या दगडांची उंच इमारत पाहिजेच. अर्थात हेडमास्तरनें क्लासांत तरी बूट, पाटलोण, आणि झिळीमिळ्यांची कोकींचें प्रदर्शन केलेंच पाहिजे. ह्या बहिरंगप्रमाणेंच शिक्षणाचा आंतील साज सजवावा लागतो. अलीकडे तर अमुक एवढी लॅबॉरेटरी आणि तमुक तेवढी लायब्ररी दाखविल्याशिवाय युनिव्हर्सिटीकडून हायस्कूललाच प्रवेश मिळत नाहीं. मग विद्यार्थ्यांना कोण पुसतो ? विद्यार्थ्यांसाठी विद्यालय नसून विद्यालयासाठींच जेथें विद्यार्थी जमतात, तेथें विद्यालयांची इज्जत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची ऐपत ह्यांमध्यें ऐहिक कोणताच संबंध नसल्यास काय नवल !
निव्वळ शिक्षणाच्या खोल दृष्टीनेंच पाहूं गेल्यास बंगाल्यांतील अशा हायस्कुलांतील शिक्षण फार कमी दर्जाचें दिसतें हें मला कबूल केलें पाहिजे. पण एक लाखाच्या उंच इमारतींतलें शिक्षण ह्या एक हजार रुपयांच्या झोपडीपेक्षां शंभर पटीनें अधिक असेंहि खास नाहीं. शिक्षणाचा उपकरणांशीं संबंध कमी आणि शिक्षकांच्या दर्जाशीं आणि त्यांच्यांत व शिष्यांत जी सहानुभूती असणार तिच्याशीं अलबत जास्त. ही दुसरी मिळकत म्हणजे सहानुभूति मला ह्या शाळांतून विपुल दिसली. आमच्या इकडच्या हायस्कूलच्या राजमहालांत एखादें भोकरवाडींतले पोरगें गेलें तर पहिल्या दिवशीं तें भेदरून जातें. टिकून राहिलेंच तर सहामाही परिक्षेच्या को-या कागदांचाहि खर्च त्याला न झेपल्यामुळें त्याला हा नाद सोडावा लागतो व शिष्य-शिक्षक नातें कमी सांगावें तितकें अधिक बरें.
वीस वर्षांतील ही प्रगति पाहून मला सर्व बाजूंनीं समाधानच झालें, असें म्हणवत नाहीं. तरी संख्येच्या व इतर दर्शनी बाजूंनीं नामशूद्र ग्रॅज्युएट सामान्य बंगाली ग्रॅज्युएटसारखाच दिसतो, हें खरें. असे शेंदोनशें तरी ग्रॅज्युएट आमच्या इकडे मराठ्यांत आढळतात. तसेंच तिकडे नामशूद्रांत आढळतात. पण आमच्या इकडे शिवाजी मराठा हायस्कूल हें एकच एक सा-या इलाख्यांत मराठ्यांनीं चालविलेलें तर तिकडे चारच जिल्ह्यांत १३ हायस्कूलें मला दिसलीं. आमच्या ह्या हायस्कुलांत सर्व शिक्षक मराठे नाहींत. ते कधीं मिळतील तें सांगवत नाहीं. पण तिकडील शाळेंत बहुतेक सर्व नामशूद्र ! एकंदरींत इकडील मराठ्यांपेक्षां उच्च शिक्षणांत तिकडील नामशूद्रांची स्थिति बरी म्हणविते आणि हि सर्व धांव गेल्या वीस वर्षांत त्यांनीं मारली हें विशेष !

पुराणिक आणि हरिदास

हीं पुराणें संस्कृतांत असल्यामुळें, हीं वाचून दाखविण्यासाठीं राजवाड्यांतून, झोपडींतून आणि रस्त्याच्या चव्हाट्यावर धंदेवाईक ब्राह्मणांची अद्यापि जरुरी आहे. ज्या पाटावर बसून हे पुराणिक पुराण सांगतात, त्याला व्यासपीठ म्हणतात. काशीप्रयागाकडे रस्तोरस्तीं अशा सार्वजनिक व्यासपीठांचे खुंट कायमचे उभे आहेत. त्यावर जे ब्राह्मण आल्या-गेलेल्या श्रोत्यांची वाट पाहात बसलेले असतात, त्यांना व्यास अशी बहुमानाची संज्ञा अद्यापि आहे. पूर्वीं राजवटींतून जे पुराणिक असत, ते वसिष्ठाप्रमाणें तपस्वी आणि चाणक्याप्रमाणें क्रांतिकारक मुत्सद्दीहि असत. ज्ञानमंबदर ह्यानें मदुरेच्य पांड्य राजास बौद्ध धर्मांतून शैव धर्मांत आणि रामानुजाचार्यांनीं म्हैसूरच्या बिट्टीवर्धनाला जैन धर्मांतून वैष्णव धर्मांत आणि अशाच एका पुराणिकानें विजयनगरच्या राजाला शैव धर्मांतून वैष्णव धर्मांत नेलें. ‘राजा बोले आणि दळ हालें’ अशा न्यायानें ह्या धर्मक्रांत्या केवळ वैयक्तिक आणि शांततेच्या पायावर घडलेल्या नसून राजाच्या मागोमाग त्यांच्या मुक्या प्रजाजनांनाहि रक्ताच्या पाटांतून पोहत जाऊन नवीन धर्मांचें परतीर गांठावें लागत असे. पुराणिकांच्यापेक्षांहि हरिदासांचें वजन बहुजनसमाजावर तर अधिकच असें. दोघेहि सख्खे भाऊच म्हणावयाचे. बौद्ध आणि जैन धर्मांवर कुमारिल भट्टांनीं व त्यांचे शिष्य आद्य शंकराचार्यांनीं विजय संपादिल्यावर शैव धर्माची दक्षिणेंत प्रतिष्ठा झाली. आणि पुन: ह्या शैव धर्मावर कुरघोडी करण्यासाठीं वैष्णव धर्माला ह्या हरिदासांची मोठीच मदत झाली. ह्यापैकीं बरेचजण मोठे सद्भक्त होते, ह्यांत शंका नाहीं. पुराणिक ब्राह्मणच असावयास पाहिजे, कारण पुराणें संस्कृतांतच असतात. पण हरिदास कोणत्याहि जातीचा असल्यास चालतो, व तो आपली कथा चालू देशी भाषेंत करितो, म्हणून त्याचें प्रस्थ जनतेंत फारच माजलेलें असतें. जें यश आजकालच्या वर्तमानपत्रकर्त्यांना व व्याख्यात्यांनाहि मिळालें नाहीं, तें ह्या पुराणिकांनीं व विशेषत: हरिदासांनीं मिळविलें. हरिदासाला उत्तर हिंदुस्थानांत कथाकथक आणि दक्षिण हिंदुस्थानांत कालक्षेपक अशीं नावें आहेत. त्रावणकोर आणि मलबारांत ह्यांना अंपलवासी अशी संज्ञा आहे. कदाचित् ही संस्था याच नैर्ऋत्य कोप-यांत उद्य पावून पुढें सर्व हिंदुस्थानभर पसरली असावी. याशिवाय दशावतारी दास, पोतदार व इतर असेच फिरते तमासगीरहि रामलीला, कृष्णलीला, शिवलीला, मरीआई वगैरे लाकडी चित्रांचे खेळ दाखवून अगदीं खालच्या जातींतून धर्माच्या कल्पना पसरून आपलीं पोटें भरीत.

पुराणांचा विपर्यास

पुराणांचा काल खरें पाहतांना वेदांच्याहि पूर्वींचा आहे. अव्वल पुराणग्रंथांतून अति प्राचीन काळच्या दंतकथा एकत्र केलेल्या असाव्यात. वेदांप्रमाणेंच द्वैपायनव्यासांनीं पुराणांचीहि संहिता जमविली असें प्रसिद्ध आहे. पण हीं मूळ पुराणें हल्लीं उपलब्ध नाहींत व पुढें होण्याची आशाहि नाहीं. हीं पुराणें क्षत्रियांनीं आपली देवादिकांची आणि सर्व जगताची पूर्वपीठिका ठरविण्यासाठीं रचिलीं होतीं. ह्या प्रकरणीं कलकत्त्याचे माजी हायकोर्ट जज्ज पार्जिटर ह्यांनीं ‘Ancient Indian Historical Tradition’ नांवाचा जो ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध केला आहे तो बिनमोल आहे! जेव्हां क्षत्रिय दुर्बल आणि ब्राह्मण सबळ झाले अशा काळीं बौद्ध आणि जैन संप्रदायांना हाणून पाडण्यासाठीं शैव-शाक्त वैष्णव मतवादी ब्राह्मणांनीं वरील मूळ क्षत्रियकृत पुराणांच्या आपल्या दृष्टीनें सुधारून व छाटाछाट करून विस्तारपूर्वक नवीन आवृत्त्या काढण्यास सुरुवात केली. मुख्य पुराणें अठराहून जास्त आणि उपपुराणें तर असंख्यच आहेत व अद्यापि नवीन निर्माण होत आहेत. हरतालिका आणि सत्यनारायणाची पोथी अशा अगदीं अलीकडच्या उपपुराणांना तर हल्लीं चातुर्मास्यांत दरसाल वेदान्तसूत्रें आणि भगवद्गीता ह्यांच्यापेक्षांहि अधिक भाव येत असतो.

जीं हीं पुराणें प्राचीन युगांत जगताच्या उत्पत्तिशास्त्रासाठीं रचलीं व गाइलीं जात असत, तीं ह्या मध्ययुगांत सांप्रदायिकांनीं परस्परांच्या उलट उखाळ्यापाखाळ्या काढण्याचीं लौकिक साधनें केलीं. हल्लीं मोहरमांत जसे कलगीवाले व तुरेवाले शाहीर आपल्या कवनांच्याद्वारें लढत खेळतात, तसे हे पुराणकर्ते एकमेकांच्या देवांना व गुरूंना उघड उघड शिव्या देऊन आपला संप्रदाय वाढवूं लागले. हल्लींच्या २०|२५ वर्षांच्या गणपति-उत्सवांतील मेळ्यांचीं पदें जर कोणीं चतुर संपादकानें एकत्र करून प्रसिद्ध केलीं तर तें एक सुंदर (?) गणपतिपुराणच होईल. असो. हीं मध्ययुगीन पुराणें लवकरच इतकीं लोकप्रिय झालीं कीं, कंटाळवाणी आणि किळसवाणी वेदोक्तपूजा मागें पडून ह्या पुराणांत सांगितलेल्या बहुरंगी तांत्रिक पूजाच सर्वमान्य झाल्या. केवळ युद्धासाठीं आणि लौकिक देवाच्या बडेजावासाठीं रचलेल्या जाळ्यांत शूद्रांप्रमाणेंच ब्राह्मणांचेहि गळे गुरफटले. कांहीं थोड्या नैमित्तिक गृह्यसंस्काराशिवाय वेदमंत्रांची आठवण ब्राह्मणांनाहि होईना, मग इतरांची गोष्ट दूरच राहिली. पापमूलक जादूचा डाव मरणाराला सोडून मारणारावरच उलटतो. त्या न्यायानें ह्या पुराणरूपी विषारी पेवांत हिंदु सांप्रदायिकच गडप झाले आहेत; बौद्ध हिंदुस्थानाबाहेर आणि जैन हिंदुस्थानांतच ह्या पेवापासून दूर सुरक्षित आहेत! वेदोक्ताचा आणि पुराणिकांचा खरा ऐतिहासिक अर्थ आणि सांप्रदायिक पेंच न कळल्यामुळें कांहीं ब्राह्मणेतर मात्र ह्या शुष्क वादाचें भूस अलीकडे विनाकारण कांडीत बसले आहेत!

  1. पुरस्कार
  2. पुण्यांतील जाहीर सभा
  3. पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी!
  4. परिषदेचें सहकार्य
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
  • 75
Page 71 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी