1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

पुरवणी नं. १ - रोजनिशिंतील वेंचे

सन १८९८ च्या आरंभापासून मी डायरींत बराच मजकूर लिहून ठेवला आहे. त्यांतील कांहीं वेंचे येथें देणें बरें वाटतें. बी. ए. मध्यें इतिहास हा विषय ऐच्छिक घेतला होता. त्याचें कारण मला हा विषय खरोखर आवडत होता. त्या वयांत मला स्वतंत्र विचार आणि टीका करण्याची संवय कशी लागत चालली हें खालील उता-यावरून दिसतें.

(१) थोरले शाहूमहाराज
ता. ३१ मार्च १८९८
थोरल्या शाहूचे चरित्रावरील विचार
मल्हार रामराव चिटणीसकृत थोरले शाहुमहाराजांचें चरित्र आतां नुकतेच वाचून संपलें. या बखरींतील कांहीं कांहीं मुख्य गोष्टींचे शक चुकले आहेत. पुष्कळ गोष्टी मागेपुढें लिहिलेल्या आहेत. दाभाड्यांच्या घराण्याची व पेशव्यांची चुरस, पेशव्यांचा व भोसल्यांचा तंटा (नानासाहेब व रघुजी भोसले यांचा), पेशव्यांचा व प्रतिनिधी यांचें वैमनस्य इत्यादि ऐतिहासिक महत्त्वाच्या वादग्रस्त बाबींचा विचार करावा तितका बखरकारांनीं केलेला नाहीं. यावरून चिटणीसाजवळ बरेच कागदपत्र असूनही त्यांचा उपयोग त्यांनीं किती केला असेल याची शंका वाटते. सर्व प्रसंगीं पेशव्यांची तरफदारी केलेली आढळते. ज्या बाळाजीवर ग्रांटडफ आपमतलबीपणाचा व अराजनिष्टतेचा आक्षेप करतो व ज्यानें सकवारबाईस जुलुमानें सती जाण्यास भाग पाडलें असे डफ म्हणतो, ज्या बाळाजीनें शाहूचे मरणानंतर सातारा हा राजकीय तुरुंग व पुणें हीच मराठ्यांची राजधानी केली, हे तर इतिहासप्रसिद्धच आहे, त्याच बाळाजीची एकाद्या कृतयोगांतल्या सेवकांस शोभतील अशी, बावनकशी राजनिष्ठेचीं उदाहरणें बखरींत सांगितलीं आहेत व त्याच उदाहरणांवरून शाहुची हुकुमत किती होती हें दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्याचे विलासी कारकीर्दीत बहुतेक प्रधान व सरदार शिरजोर होत चालले होते त्याचेच आज्ञेवरून सर्व गोष्टी होत होत्या असे म्हणण्यास याहून फारच निराळा पुरावा पाहिजे. शाहूची कारकीर्द म्हणजे मराठेशाहीची (पेशवाईची नव्हे) भरभराट होय. शिवाजी महाराजांनीं कमावले, संभाजी महाराजांनीं गमावलें, राजाराम महाराजांनीं सावरलें, शाहूनें “शहाण्या” प्रधानाच्या मदतीनें वाढवलें व उपभोगिलें. शककर्त्या महात्म्याचा कडवेपणा संभाजी महाराजांत उतरला, राजकीय धोरण व हिंमत राजारामांत उतरली व अवशेष राहिलेला व्यक्ति विषयक चांगुलपणा तेवढाच शाहूमहाराजांचे वांट्यास आला. ह्या राजश्रींनीं मराठ्यास न शोभणारे गुण, विलास, नेभळेपणा व परावलंबिता इत्यादि, मोंगली झनानखान्यांतून आणले होते. त्या योगानें मोठमोठ्या व्यक्तींनीं त्यांचेभोवतीं जमून त्यांचे नांवाचे आश्रयाखालीं राज्याची मर्यादा जरी दूरवर वाढवली तरी सर्वाकर्षक मध्यशक्तीचा कमजोरपणा त्यांना दिसून चुकल्यामुळें ते डोईजड होऊन परस्पराशीं विरोध करूं लागले. व शाहुचे मरणानंतर मध्यशक्तीचा पूर्ण –हास होऊन अगर तिचें रुपांतर होऊन ते स्वतंत्रपणे वागूं लागले. येथेंच मराठेशाही संपली! नारायणरावाचे खुनानंतर पेशवाईचीहि अगदीं अशीच स्थिति होऊन साता-याप्रमाणें पुण्यासहि एक राजकीय तुरुंग झाला. शिंदे व फडणीस यांचे मध्ये दंडेली चालली. पुढें महादजीच्या व सवाई माधवरावांच्या मरणानंतर सर्व जगाच्या इतिहासास काळीमा लावणारी म्हारकी सुरूं झाली. तिचा लय १८१८ त झाला. कुठें शिवाजीमहाराजांनीं केलेला मराठेशाहीचा उदय आणि कुठें रावबाजीनें चालवलेल्या म्हारकीचा अंत! पण या राक्षसी भेदाची जबाबदारी एकट्या शिवाजीमहाराजांवर किंवा रावबाजीवर नाहीं; तर ती सर्व मराठ्यांवर आहे; एवढें तरी समजल्यास पुष्कळ झालें. नाहींतर रावबाजीस शिव्यांची लाखोली व शिवजयंत्युत्सव यांतच आम्ही दमून जाणार.” गतेतिहासाप्रमाणें चालू गोष्टीकडेहि माझी विवेचक नजर होती. हें खालील उता-यावरून कळेल -

(२) वसंत व्याख्यानमाला
 ता. ३० सोमवार, मे १८९८
“यंदा मालेची फार दैना दिसत आहे. दुष्काळ व प्लेग यामुळें फुलें (मालेची) कां महाग व्हावी हें कळत नाहीं. पण ‘वर जातीची’ फुलें मिळाली नाहींत म्हणून कोरांटीची व बाभळीचीं फुलेंच मालाकारांनीं जमवण्याचा सपाटा चालवला आहे. यावरून एक नुसती लांबलचक माळ कशीबशी तयार केली कीं काम आटोपलें असें यांना वाटतें. पुण्यास, जर आपण विद्वत्तेचे आगर आहों, अशी खरीच प्रौढी मिरवायची झाल्यास त्यानें आपली जबाबदारी यापेक्षां चांगल्या रीतीनें जाणली पाहिजे. उठल्यासुटल्यानें भाषणें दिल्यानें महाराष्ट्राची किंबहुना हिंदुस्थानची अब्रू जाणार आहे. माझ्या मतें असल्या मालेच्या द्वारें कांहीं ख-या विद्येचे विलास लोकापुढें आले पाहिजेत. नुसते वक्तृत्व पाजळणें, शाळेच्या चार शेंबड्या पोरांकडून टाळ्या घेणें किंवा सर्वांस माहीत होऊन शिळ्या होत आलेल्या चालू चळवळींचे चर्वीत चर्वण करणें, वगैरेकरतां ही माला नव्हे. महाराष्ट्रांतल्या चार विद्वान डोक्यांत विचारांच्या ज्या कांहीं घालमेली होत असतील त्या सर्व या मालेच्या रूपानें लोकांपुढें आल्या पाहिजेत. म्हणजे माला ही ह्या अंतस्थ उलाढालींचे कार्य झाले पाहिजे. असे न होतां ह्या मालेची संस्थाच माला सुरूं होण्यापूर्वीं फार झालें तर महिनाभर कांहीं महत्वाकांक्षी व अधिक प्रसंगीं तरुणांच्या डोक्यांत आपण काय बोलावे व कसे बोलावे इत्यादीविषयींच्या विचारांचे काहूर उठवण्यास, कारण होते. लोकांपुढें कांहीं महत्त्वाच्या गोष्टी यावयाच्या असतात म्हणून माला होते असे नसून मालेचा संप्रदाय आहे म्हणूनच कांहीतरी शिळोप्याच्या गप्पा होतात. आमच्या व्याख्यानमाला व आमचे विवाह यांच्यात बरेच साम्य आहे. विवाह झाला म्हणून जोडप्यांस एकमेकांवर प्रीति करणें भाग आहे. प्रीति असते म्हणून विवाह होत नसतो."

(३) प्रो. गोखले यांचें व्याख्यान
प्रो. गोपाल कृष्ण गोखले यांचें भाषण आज सायंकाळीं (शनिवार ता.१६ एप्रील १८९८ रोजीं मद्रास टाईम ४ वाजतां) आमच्या कॉलेजांतील हॉलमध्यें “इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील शिक्षण” या विषयावर इंग्रजींत सुमारें दीड तास, प्रो. गोखले यांचें उत्कृष्ट भाषण झालें. एकाग्रतेनें भाषण ऐकण्याची उत्कंठा दाबवेल तितकी दाबून मला जी कांहीं थोडीबहुत टिपणें घेतां आलीं त्यावरून खालील सारांश देत आहे. प्रो. गोखले म्हणाले,  “ इंग्लंडला जाऊन आल्यापासून माझ्या आयुष्यांत पालट झाला आहे. विचार, मत व कल्पना यांस निराळेंच वळण लागलें आहे. इंग्लंडांतील उत्तम व विविध प्रकार व त्याचा अवाढव्य प्रसार पाहून मी थक्क झालो. मुलें ७ वर्षांचीं झालीं कीं प्रत्येकास शाळेंत घातलेंच पाहिजे असा सक्तीचा सरकारी कायदाच आहे. हें सक्तीचें शिक्षण प्राथमिक असून Board Schools मध्यें गरिबांस मोफत शिक्षण मिळतें. त्यांत धार्मिक शिक्षणाची भेसळ होत नाहीं. शिक्षणपद्धती मुलांस होतां होईल तों मनोवेधक होईल अशी आहे व मुलांच्या स्वाभाविक शक्तींचा विकास होईल अशीच असते. शिक्षक नेमावयाचे ते हुशार व अनुभविक नेमतात. शिक्षकांनीं तेवढ्याच धंद्याकडे आपलें आयुष्य वाहिलें असतें. मुलांस मानसिक व नैतिक शिक्षणहि दिलें जातें. सभ्य गृहस्थ व सभ्यपणा हे इंग्रजी भाषेंत विशिष्ट गुण होऊन बसले आहेत. दुस-यानें नांवें ठेवण्यासारखें एकहि कृत्य त्यांचे नजरेस आलें तरी ते त्याचा बभ्रा किंवा उहापोह करणार नाहींत. प्रसंगाशिवाय दुस-याच्या वाटेस जाणार नाहींत, अपमान करणार नाहींत किंवा नेभळेपणानें सहनहि करणार नाहींत. असल्या सभ्यपणाचे परिणाम शाळांतून घडतात. तरी ते विशेषकरून गृहशिक्षणापासूनहि होतात. त्याचप्रमाणें कॉलेजचें शिक्षण, तेथील प्रोफेसरांची विद्वत्ता व योग्यता पाहून येथील इंडियन प्रोफेसरशिपची मला फारच लाज वाटली. स्वतःचे बरेच मूळग्रंथ लिहून विषयांच्या ज्ञानांत जास्त भर घातल्याविना प्रोफेसराचें पद मिळत नाहीं. टॉड हंटरनें इतकीं पुस्तकें लिहिलीं तरी तो नुसता फेलोच आहे. क्लासांत रोज लेक्चर देणा-यांचा ट्यूटर्स नांवाचा निराळाच वर्ग असतो. ट्यूटर्सहि फार जाडे विद्वान असतात. प्रोफेसरांचीं व्याख्यानें वर्षांतून फार तर ३।४ होतात आणि तीं वर्षभर केलेल्या अध्ययनांचे दिग्दर्शनेंच असतात. प्रोफेसरांनीं अमुक एक केलें पाहिजे असें कांहीं नियम नसतात. त्यांच्या आवडत्या व्यासंगाला योग्य तो वाव दिला जाण्याची विद्याधिकारी खबरदारी घेतात. आपण शिकत असलेल्या शाळेंतच आपल्या मुलांनीं जावें अशी तेथील आईबापांची इच्छा असते आणि एकदां तो शाळेंत गेला कीं अखेरपर्यंत (सिव्हिल सर्व्हिसपर्यंतहि) तेथेंच त्याचा अभ्यास व्हावा अशी व्यवस्था असते. वरील प्रकारचें शिक्षण शिकण्यांत आपला पुढें चरितार्थ चालावा असा उद्देश तेथें कोणाचा नसतो. त्यामुळें सर्व लक्ष नुसते परीक्षा पास होण्याकडेच नसते. कांहीं दिवस कॉलेजच्या उच्च वातावरणांतच त्यांस अधिक महत्त्व वाटत असते. युनिव्हर्सिटींत असतांना परीक्षेच्या शिक्षणाच्या परिणामापेक्षां मुलांच्या मनावर सहशिक्षणाचा परिणाम होऊन त्यांच्या स्वभावाचा विकास फारच समाधानकारक होतो. क्लब्ज Clubs, Reading Rooms, Play grounds यांतून खेळण्याकडेच अर्ध्यापेक्षां अधिक वेळ जातो. लाखों पुस्तकांच्या जंगी लायब्र-या असतात. हें सर्व पाहून मी इतका स्तिमित झालों कीं आपण दहा वर्षांचा होऊन येथें शिकावयाला राहिलों तर फार बरे होईल असें वाटलें. आमच्याकडे पहावे तर शिक्षणाचा बाजारच भरत आहे. मुलांच्या आवडीकडे दुर्लक्ष्य करून शिक्षण त्यांचे डोक्यांत एकसारखे कोंबले जात आहे. येथील प्रोफेसर्स तेथल्या ट्यूटसर्सची देखील बरोबरी करूं शकत नाहीं. येथील कॉलेजांचा उद्देश हलका, पद्धत दूषित, शिक्षण अपुरे, एककल्ली व नकली!” इत्यादि इत्यादि. भाषण झाल्यानंतर सभेचे अध्यक्ष प्रिन्सिपॉल राजवाडे हे आपल्या अध्यक्षीय भाषणांत घोकंपट्टी व पोकळ ज्ञान याविषयीं म्हणाले कीं, “ज्या अर्थी आम्ही शिकतो हें ज्ञान अगदी नवीन व उसने मागून आणलेलें आहे त्याअर्थी तें आपल्या पदरीं पडलें असें नुसतें वाटायला निदान घोकंपट्टीच पाहिजे. परक्या देशांतील ह्या झाडाची लागवड तूर्त कांहीं दिवस तरी अशा जबरीच्या उपायानेंच एथें करावी लागत आहे हें खरें. पण त्याला उपाय नाहीं. तसेंच तिकडचे प्रोफेसर्स व इकडचे प्रोफेसर्स यांमधील लज्जास्पद अंतर पाहून तर मी खचूनच गेलों. असें वाटते कीं जागेचा (प्रिन्सिपॉल शिपचा) राजीनामा देऊन स्वस्थ बसावे!” तेव्हां गोखले, “छे छे,” असे उद्गारले. त्यावेळीं श्रोतृसमाज मोठ्यानें हसला. स्वतः राजवाडेहि हसूं लागले. शेवटीं समारोपाचे भाषणांनंतर सभा विसर्जन पावली. गोखल्यांच्या भाषणावर मी पुष्कळ विचार केला. त्यांनीं केलेल्या इंग्लंडांतील शिक्षण पद्धतीचें वर्णन पुष्कळच एकतर्फी आहे. खुद्द इंग्लंडांतहि तेथील शिक्षण पद्धतीबद्दल सारखी ओरड आहे. यासाठीं त्यांनीं तिचे कांहीं दोषहि दाखवावयास हवे होते. ती संपूर्णतः निर्दोषी असेल असें मुळींच वाटत नाहीं. हिंदुस्तानाला युरोपांत शिकण्यासारखे अद्यापि पुष्कळच आहे व ते हिंदुस्थान शिकत आहेच. पण स्वतः युरोपलाहि हिंदुस्तानांत शिकण्यासारखे अजूनहि बरेच आहे. तें मात्र स्वतः हिंदुस्तानच पाश्चात्य सुधारणेच्या दडपणाखालीं विसरत चाललेला आहे; मग युरोप कोठून शिकणारॽ

(४) विशाळगडची सफर
सफरीचा बेत     
सन १८९९ च्या उन्हाळ्यांत प्लेगचा कहर पुण्यांत सुरूं झाला. सुटीमुळें मी जमखंडीस आलों होतों. चि. जनाक्का हुजुरपागेच्या शाळेंतून येणार होत्या. अनेक खाजगी गोष्टीनें मन फार उद्विग्न झालें होतें. महाराष्ट्रांतील प्रसिद्ध डोंगरी किल्ले पाहण्याची फार हौस होती. सृष्टीची शोभा पाहणें व ऐतिहासिक दृष्टि हे दोन हेतू होते. मी बरेच किल्ले पाहिले होते. तरी त्यांतल्यात्यांत विशाळगड हा अगदीं एकीकडचा प्रचंड मनोहर किल्ला पाहावयाचे मनांत आले. बरोबर जनाक्काला घेऊन जावयाचा बेत करूं लागलों. कोल्हापूरचे गोविंदराव शासने यांना घेऊन ता. २१ एप्रील १८९९ रोजीं पन्हाळगडाला पोंचलों. चार दिवस पन्हाळा आणि पावनगड पाहिला. वासुदेवराव सुकठनकरांची आईबाप, बहिणभाऊ वगैरे मंडळी पन्हाळ्यास राहात होती. आमचे मित्र चिंतामणराव कुलकर्णी, हर्डीकर, गोविंदरावचे मित्र भाऊसाहेब माने वगैरे मंडळी पन्हाळ्यास आली. सगळे एकत्रच राहात होतो व मजेंत हिंडत होतो.

वाडी रत्नागिरी     
ता. २५ एप्रील रोजीं मंगळवारीं चैत्री पौर्णिमेच्या दिवशीं जवळच्या ज्योतिबाचे डोंगरावर वाडी रत्नागिरीची मोठी यात्रा भरत असे. प्लेगमुळें मोठी यात्रा भरली नव्हती. १२ ज्योतिर्लिंगापैकीं हें एक ठिकाण आहे. आसपासच्या खेड्यांतून ज्योतिबाच्या उंच काठ्या (सासणी) सुमारें २० आल्या होत्या. ह्या काठ्या म्हणजे बांबूचे उंच सोट, कापड अगर चीट गुंडाळलेले व मधोमध तोल राखण्यास दोर लावलेले अशा असतात. खालून ५।६ फूट अंतरावर लाकडी जाड फळी बसवलेली असते. ह्या फळीवर देवाची लहान उत्सवमूर्ती ठेवलेली असते. तरुण उमेदीचे लोक ही फळी काठीसह डोक्यावर घेऊन देवळांस तीन प्रदक्षिणा घालीत असतात. भोंवतीं ७।८ जण दो-यांनीं तोल संभाळतात. वाद्यांच्या गजरांत सर्व बेहोष नाचतात. कितीही तोल संभाळला तरी केव्हां केव्हां काठी माणसावर पडते. देवाला मांसाचा नैवेद्य चालतो. देवाला गुलाल, खारका, खोबरें, यांची मोठी आवड दिसते. मुख्य दैवत ज्योतिबा त्याचे तोंड दक्षिणेस कोल्हापूरकडे आहे. आवारांत तीन उंच शिखरे आहेत. यावरून तीन मुख्य दैवतें येथें दिसतात. एका भागांत महादेवाचें लिंग असून तें स्वयंभू आहे असें म्हणतात. हें ज्योतिबाचे उजवे बाजूस उत्तराभिमुखी आहे. ह्या लिंगाचे उजवे बाजूस पश्चिमामुखी एक देवी उभी आहे. हिचें नांव चोपडाई असून ती ज्योतिबाची आई असें सांगतात. तिसरें दैवत ज्योतिबा अथवा केदारलिंग होय. देऊळ सुंदर, मोठे व मजबूत असून त्यावरील काम सुंदर कोपरेदार आहे. दक्षिणेंतील सौंदत्तीचे यल्लमाचें देऊळ असेंच आहे. मंडपाचे डावे बाजूस तुकाईची मूर्ति आहे. उत्तरेकडे लांब खालच्या बाजूस यमाईची मूर्ति आहे. यमाई ज्योतिबाची बहिण म्हणतात. ती त्यास नवरी पहाण्यास गेली होती. नवरी सांपडली नाहीं म्हणून यमाई बाहेरच राहिली. केदारविजय म्हणून एक पोथी आहे तींत येथील सर्व महात्म्य आहे.

पांडवदरी     
ता. २६ सकाळीं ९ वाजतां दशम्या वगैरे करून घेऊन जनाक्कासह आम्ही सर्व मित्रमंडळी पायीं चालत पांडवदरीस निघालो. ही दरी पन्हाळ्याचे पश्चिमेस पांच मैलांवर आहे. दरम्यान म्हसाईचें मोठे पठार ओलांडावें लागतें. हें पठार बहुतेक पन्हाळ्याइतकेंच उंच असून वर अफाट व सपाट मैदान आहे. पन्हाळ्याचा हंडाबुरुज व हें पठार यांस मध्यें एका उंच पातळ सुळकेदार नैसर्गिक भिंतीनें जोडलें आहे. ही भिंत सुमारें अर्धा मैल लांब असून हिच्या शिरोभागीं दहावीस फूट उंच अणकुचीदार दगड उभे आहेत. ते पांढरे असल्याकारणानें ही भिंत नुकतीच घासलेल्या करवतीप्रमाणें तीक्ष्ण व चमकदार दिसते. या दगडांतून वाघाला राहण्याची चांगली सोय आहे. शिवाय ह्या उंच भिंतीमुळें पन्हाळ्याच्या दक्षिणेस रांगण्यास जावें लागलें तर पावनखिंडींतून वाट आहे. नाहींतर पावनगडास किंवा म्हसाईच्या अवाढव्य पठारांस वळसा घालावा लागतो. म्हणूनच नरवीर बाजी देशपांड्यानें पावनखिंड अडविली होती. अशा मनोहर कड्यास घाटशीळ म्हणतात. पन्हाळा उतरून म्हसाईचे पठारावर चढतांना खंडाळ्यांतील Tiger leap नांवाच्या अतिखोल दरीची आठवण होते. या बाजूवर दाट उंच झाडी आहे. वाटेंत झ-यावर जागजागीं रेडयाची लहान मोठीं पावलें खडकांत खोल रुतलेलीं दिसलीं. महिषासूरमर्दिंनीनें महिषासुरांशीं तुळजापुरापासून लढत येऊन येथें त्याचा वध केला असल्याचें सांगतात. चार मैल चालून गेल्यावर पांडवदरीजवळ म्हसाईचें लहानसें देऊळ लागते. येथें तुंबळ युद्ध झाल्याचे सांगतात. रेड्याची व माणसाची पुष्कळ पावलें वीत वीतभर खोल उमटलीं आहेत. ही देवी नवसास फार पावते. हे नवस म्हणजे “अमक्याने आमचे असे वाईट केले म्हणून म्हसाई तूं त्याचे वाईट कर” असें असतात. येथें नेहमी पशूंचें रक्त सांडलेलें असतें. बारा वाजतां पांडवदरींत उतरलों. तोंच उदास वाटूं लागलें म्हणून जनाक्कानें कांहीं भक्तीपर पदें गायिलीं. पांचाचे सुमारास पन्हाळ्यास परत आलो. या पांचसहा दिवसांचे प्रवासांत आम्हांला रोज निदान १०।१५ मैलांची तरी चाल पडत असे. पन्हाळा व पावनगड हे टुमदार व सुंदर किल्ले असून भोंवतालीं सुंदर वनश्री आहे.

मलकापूर     
ता. २७ एप्रील १८९९ रोजीं संध्याकाळीं ७ वाजतां बैलगाडींतून विशाळगडास निघालों. बरोबर जनाक्का, गोविंदराव शासने, भाऊसाहेब माने, चिंतामणराव कुलकर्णी आणि हर्डीकर इतकी मंडळी होती. रात्रीची वेळ, वाटेंत चोरट्यांची भीति होती म्हणून आम्हीं बराच वेळ गाडीमागून चालत होतों. बांबोड्याचे धर्मशाळेंत दोन तास निजून सकाळीं मलकापुरास ८ वाजतां पोहोंचलों. हा गांव सुमारें तीन चार हजार वस्तीचा असून येथें कोल्हापूरचे पंत प्रतिनिधी श्रीमंत विशाळगडकर यांची राजधानी आहे. हा भाग पन्हाळ्याचे दक्षिणेस २१ मैलांवर आहे.

गजापूरचे रान     
दुसरे दिवशीं मलकापुराहून तिसरे प्रहरीं निघालों. तेथून सारखी चढण लागते. मांजरे गांवाला येईपर्यंत रात्रीचें ११ वाजलें. तेथें जंगलांतच निजून पहाटे तीन वाजतां निघालों. चांदणें पडलें होतें. वाटेनें दाट जंगल लागलें. येथून मात्र पहाटेपर्यंत पारधीचें किर्र जंगल लागलें. दुतर्फा एकमेकांशीं लागलेले गगनचुंबी वृक्ष स्तब्ध तपस्याप्रमाणें उभे होते. त्यावरून दाट रानवेली शेंड्यापासून बुडख्यापर्यंत लोंबत होत्या. वाट चढणीची म्हणून बैल हळू चालले होते. मधून मधून पालवींतून चांदण्याचे ठिपके पडले होते. चहूंकडे इतकी सामसूम होती कीं गाडीच्या चाकाचा आवाज व बैलांच्या गळ्यांतील जंगांचा नाद अरण्यभर गुंगत होता. आमचा गाडीवानही रंगेल गडी होता. “माझ्या चत्तुरा बैला चल. माझ्या पट्टाण्या बैला वड” इत्यादि लके-या मुक्तकंठानें मारूं लागला. त्याचे गंभीर प्रतिध्वनी उमटूं लागले. एकही घातूक जनावर भेटलें नाहीं. आम्हांला वाटलें कीं गाडीवानाच्या ताना ऐकून हिंस्त्र पशुंनाही झोंप लागली असावी. कैद्याप्रमाणें गाडींत बसवेना म्हणून मी खालीं उडी टाकली. कुलकर्णी व हर्डीकरही उतरले. आम्ही उतरूं नये म्हणून जनाक्कानें पुष्कळ आग्रह केला. याच रानांत कोल्हापूरकर व इचलकरंजीकर वाघाची शिकार करतात. इकडून अस्वल येईल काय, तिकडून वाघ येईल काय अशा धास्तींत वाट चालत होतो. पण एका कपिवर्गाशिवाय आमचे कोणीच स्वागत केलें नाहीं. कारण असले अश्रुतपूर्व गाणें-बजावणें ऐकून तटस्थ न होणारा एका चावट माकडाशिवाय दुसरा कोण अरसिक प्राणी आहे! पहाट झाली, आम्हाला अत्यानंद झाला. जंगल संपून उघड्यावर आलों तोंच एक सुंदर स्वच्छ नदी सामोरी आली. ही पहाट मी कधीं विसरणार नाहीं.

विशाळगड     
ता. २९ एप्रील रोजीं सकाळीं गजापुरास पोहोचलों. पुढें गाडीची वाट नाहीं म्हणून ह्या उमद्या गाडीवानाला परत लावले. पेठेपासून पांच पैसे देऊन आमचा बोजा उचलण्यास एक हमाल केला. पेठ नांवाचीच होती. नारळाशिवाय कांहीं सामान मिळालें नाहीं. डोंगर चढलों तरी गड कांहीं दिसेना. शेवटीं अगदीं शिखरावर पोचलें तों एकदम भयंकर खोल खंदक आणि त्यांत बशींत कप ठेवावा असा किल्ला व त्याचे सरळ तुटलेले काळे कडे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. बराच वेळ पहात उभे राहून मग खंदक उतरूं लागलो. आठ वाजतां गडावर पोहोंचलो. हा गड पन्हाळ्याहून सुमारें ४० मैलांवर नैऋत्येस आहे. नांवाप्रमाणें खरोखरीच विशाल आहे. इतर गडाप्रमाणें आसमंतांतील टेकड्यांवरील चौथ-यावर हा आरूढ झाला नसल्यामुळें अगदीं जवळ गेल्याशिवाय गड असा ओळखतच नाहीं. किल्ला पाहण्याचा जर कोणाचा पहिलाच प्रसंग असेल तर त्यांनीं हा किल्ला अवश्य पहावा. मुद्दाम खणून तयार केल्याप्रमाणें दिसणारा अति गंभीर खंदक, त्याचप्रमाणें सरळ उभे असलेले गडाचे कडपे, त्यांना बुरुजाप्रमाणें आधारभूत झालेल्या व टोंकांपासून खंदकांत दूरवर उतरत येणा-या डोंगराच्या तीक्ष्ण धारा, जागजागीं ह्या धारा तुटल्यामुळें कित्येक वर्षे तसेंच खडे राहिलेले, शूर व धिप्पाड
गडक-याप्रमाणें भासणारे, काळे उंच फत्तर हें सर्व निसर्गाचें विराटस्वरूप पाहून प्रेक्षकांस एकामागून एक आश्चर्याचे जबर धक्के बसल्यावांचून राहात नाहीं. गडावर श्रीमंत मलकापूरकरांचा वाडा आहे; त्यांत आम्ही दोन दिवस आनंदांत काढले. भूक इतकी तीव्र लागे कीं एकमेकांस फाडून खाण्याची इच्छा होई.

अंबाघाट     
गेलेल्या वाटेनें परत न येतां पश्चिमेकडे खालीं कोंकणांत उतरलो. कोणी हमाल न मिळाल्यानें सर्व बोजा आम्हीच वाहून घेतला. एकांतांतील कोंकणवस्ति रमणीय दिसली, पण ती पहाण्यास वेळ नव्हता. पुन्हां वर चढून शेवटीं ता. २ मे च्या सुमारास दोनप्रहरीं अंबाघाटावरील आंबेगांवांतील धर्मशाळेंत एक दिवस काढला. कच्च्या फणसाची भाजी अतिशय गोड लागली. भाड्याची दुसरी गाडी करून पन्हाळ्यास परत आलो. हा प्रवास फारच सुखाचा आणि धाडसाचाही झाला.

परत प्रवास

प्रकरण ३० वें
शेवटचा निरोप     
३१ ऑगस्ट १९०३ रोजीं सकाळीं मी होवर्न येथून निघालो. लंडनला आणि इंग्लंडलाही शेवटचा रामराम केला. जर्मन समुद्रांतून हॉलंडची राजधानी ॲम्स्टरडॅम येथें इंटरनॅशनल लिबरल रिलीजस कॉन्फरन्स करतां गेलों. तेथें मी ता. ४ सप्टेंबरपर्यंत होतों.

एक अडचण     
विलायतेला येतांना मला बोटीच्या प्रवासाबद्दलचा खर्च श्रीमंत सरकार सर सयाजीराव महाराजांनीं दिला होता. स्वदेशीं परत जाण्याचा खर्च मिळण्यापूर्वी माझ्या कॉलेजांतील अभ्यासाबद्दल कॉलेज अधिका-यांकडून रिपोर्ट मागविण्याबद्दल हुकूम महाराजांकडून झाला होता. त्या प्रमाणें हा इंग्रजींत रिपोर्ट अध्यापकांकडून महाराजांकडे गेला. तो पुरवणी नं. २ मध्यें पुढें दिला आहे. त्याअन्वयें मीं महाराजांकडे अर्ज केला असतां त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडून पत्र आलें कीं, मी स्वदेशीं परत गेल्यावर बडोदें संस्थानांत नोकरी करण्याबद्दलचा करार लिहून देईन तर हा खर्च मिळेल. मी ता. १ मे १९०३ रोजीं महाराजांना खुलाशाचें सविस्तर पत्र लिहिलें कीं, “मला जी युनिटेरीयन स्कॉलरशिप मिळाली होती तिची एक शर्त अशी होती कीं, मी आजन्म स्वतःला धर्मप्रचारासाठींच वाहून घेईन. यदाकदाचित् माझ्या योगक्षेमाची कोणीं जबाबदारी घेतली नाहीं, तर या प्रचाराला प्रतिकूल होणार नाहीं असेंच एकादें काम करून उदरनिर्वाह करीन; पण प्रचार सोडणार नाहीं. महाराजांनीं हें सर्व पसंत केलें होतें. म्हणून आतां कोणती हरकत न घेतां स्वदेशीं परत जाण्याला मला ते मदतच करतील.” हें पत्र पावतांच महाराजांनीं, टॉमसकुक कंपनीकडे तारेनें तिकीट देण्याबद्दल हुकूम केला असल्याचें त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींनीं मला कळविलें.

ॲम्स्टरडॅमचा खर्च     
कॉलेजला उन्हाळ्याची सुटी झाल्याबरोबर माझें इंग्लंडांतील काम संपलें म्हणून स्वदेशीं निघतां आलें असतें. पण ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेला मला ब्राह्मसमाजानें हिंदुस्थानचा प्रतिनिधि निवडल्यामुळें आणि ती परिषद सप्टेंबरमध्यें भरणार असल्यानें दरम्यानचा तीन महिन्यांचा खर्च आणि जादा प्रवासखर्च यांची पंचायत पडली. युनिटेरीयन स्कॉलरशिप मला दरसाल १०० पौंडांची होती. तीच अपुरी होती. मी फार काटकसरीनें राहून माझ्या खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी केली. ॲम्स्टरडॅमच्या जादा खर्चाविषयीं माझे मित्र श्रीयुत बा. बा. कोरगांवकर यांनीं वर्गणीचे परिश्रम करून ता. २५ जुलै १९०३ रोजीं पत्रानें १३ पौंड ६ शिलिंग ८ पेन्सचा (म्हणजे २०० रुपयांचा) चेक पाठविला. कलकत्त्याहून हेमचंद्रसरकारकडूनही निदान तितकीच रक्कम मिळेल असें कळविलें. अशा रीतीनें माझी अडचण भागली.

ॲम्सटरडॅमची परिषद
ता. १ सप्टेंबर रोजीं इंग्लंडहून निघालेल्या पाहुण्यांची बोट ॲम्स्टरडॅमला पोहोंचली. तींतच मी होतों. नदीच्या कांठावरच्या सुंदर अम्सटील हॉटेलांत आमची व्यवस्था झाली होती. व्याख्यानें, उपासना, मेजवान्या, यांची एकच गर्दी उसळली होती. डच लोकांनीं फारच संस्मरणीय स्वागत केलें. मीं वाचलेला, हिंदुस्थानांतील उदारधर्म हा निबंध, ह्या परिषदेचें ‘लिबर्टी’ नांवाचें जें पुस्तक प्रसिद्ध झालें त्यांत प्रसिद्ध झाला आहे.

व्होलंदाम     
ता. ४ सप्टेंबर रोजीं ॲम्सटरडॅमहून व्होलंदाम नांवाचें एक जुनें खेडें पाहाण्यास निघालों. बरोबर सुमारें निरनिराळ्या राष्ट्रांची २०० पाहुणे मंडळी होती. आम्हां पाहुण्यांची व्यवस्था ठेवण्यास डच मंडळी आली होती. सुमारें दोन वाजतां व्होलंदाम येथें पोहोंचलों. हें खेडें समुद्रकिनारीं एका धक्क्याच्या आश्रयाखालीं आहे. समुद्रसपाटीपेक्षां या खेड्याची सपाटी ४।५ फूट तरी खालीं असावी. आमची इतकी गर्दी पाहाण्यासाठीं खेड्यांतील सर्व माणसें, मुलालेकरांना घेऊन दाराबाहेर उभी होती. डच लोकांची स्वच्छतेसंबंधी मोठी ख्याति आहे. त्याप्रमाणें दोन प्रहरीं घरें धुण्याचें काम चाललें होतें. आम्हीं कित्येक घरांत शिरून त्यांच्या चुली आणि निजावयाच्या जागा पाहिल्या. साधेपणा, स्वच्छपणा व टापटीप पाहून आनंद झाला. ह्या लोकांच्या पायांत ओबडधोबड लांकडी जोडे होते. घरांत शिरतांना ते आपले जोडे बाहेर ठेवीत. आम्हांला बुटांसह आंत जाण्याला लाज वाटूं लागली. तरी आम्हांस हे लोक आंत जाण्यास खुशीनें परवानगी देत. धक्क्यावर एक दोन मैलांवर आम्ही हिंडलों. एदाम या खेड्यांत आम्ही आगगाडींतून उतरल्यावर व्होलंदामपर्यंत सुमारें दोन मैल एका कालव्यांतून जुन्या चालीच्या बोटींतून आम्ही कांहींजण निघालों. या बोटींना एक लांब लांकडी दांडा लावला असून त्यांस खांदा देऊन माणसें बोट पुढें ढकलीत असत. संध्याकाळीं ५ पर्यंत इकडे तिकडे हिंडल्यावर आगबोटींतून आम्ही परत ॲम्सटरडॅमला परत आलों. अशा रीतीनें अगदीं आनंदानें ॲम्सटरडॅम येथील परिषदेचा शेवट झाला.

कलोन कॅथीड्रल     
ता. ५ सप्टेंबर रोजीं सकाळीं कलोन येथें पोंहोंचलों. हॉटेल एविग् लॅंम्पमध्यें उतरलों. लगेच न्याहारी करून येथील प्रसिद्ध कॅथीड्रल पाहाण्यास गेलों. एवढी सुंदर इतिहासप्रसिद्ध इमारत असूनही, बाजारांतील गर्दीच्या भागांत ती कोंडल्यासारखी झाली आहे. मी चौकांतून तिच्याकडे पाहात राहिलों. हातांत कॅमेरा होता. पण चित्रासारखा कितीतरी वेळ आ वासून पहात राहिलो असतां, मलाच कितीतरी लोक पाहून गेले असावेत. आश्चर्याचा आवेग उतरल्यावर मी इमारतींत हळूंहळूं शिरलों. बांधकाम गॉथिक थाटाचें आहे. काळ्या कुरुंदाचा दगड वापरला आहे. उंच निमुळत्या कमानी एकावर एक लागलेल्या असून गॉथिक शोभेची एथें परमावधि झाली आहे.  ता. ७ सोमवारीं १९०३ रोजीं स्वित्झरलंड आणि जर्मनीच्या हद्दीवरील बाझल शहरांत थोडा वेळ राहून त्याच रात्रीं ११ वाजतां, आल्पस पर्वतांतील ल्यूसर्न या नांवाच्या अत्यंत रमणीय गांवीं पोहोंचलों. हा गांव ह्याच नांवाचे सरोवराचे कांठीं आहे. चार दिवस विश्रांति आणि एकांतवासांत घालविले. मौंट पिलाटुस नांवाच्या आल्पस पर्वताच्या शिखरावर मी एकटाच सफर करून आलों. समुद्रसपाटीपासून हें ठिकाण ७००० फूट उंच आहे. जर्मनी सोडून स्वित्झर्लंडकडे जातांना आल्पस पर्वतांतून सेंट गॉथर्ड नांवाचा १० मैल लांबीचा एक बोगदा आहे. त्यांतून आमची गाडी गेली.
ता. ११ सप्टेंबर रोजीं मी कोलंबसाच्या जिनोवा या गांवीं गेलों. ता. १२ रोजीं कॅम्पो सॅंटो नांवाची अत्यंत सुंदर स्मशानभूमि पाहिली. इटालियन शिल्पकलेची येथें लयलूट झालेली दिसली. नंतर पांच दिवस रोम शहरीं घालविले. मुंबई विद्यालयांत माझा आवडीचा विषय रोमचा प्राचीन इतिहास असल्यानें हें पांच दिवस माझें मोठ्या बोधाचे गेले. ता. १५ रोजीं रविवारीं व्हटिकन् नावाचा, पोपचा राजवाडा पाहिला. तिसरे दिवशीं पोप पायसचें प्रत्यक्ष दर्शन घेतलें. शेकडों भक्तमंडळी दूर अंतरावरून आलेली, यांच्या दर्शनासाठीं रांगेनें बसलेली होती. पोपची स्वारी जवळ येतांच ही मंडळी त्याच्या चरणाचें चुंबन घेत. माझ्यापुढें आल्यावर मी हिंदुस्थानचा रहिवासी म्हणून माझ्यापुढें आपल्या हातांतील आंगठी चुंबनासाठीं पुढें केली. मी चुंबन घेतलें.

मोझेसचा पुतळा     
सिस्टाईन चॅपेल नांवाच्या एका दालनांत हा प्रसिद्ध भव्य पुतळा एका उंच कट्ट्यावर ठेवला होता. मायकेल् अँजेलो नांवाच्या प्रसिद्ध शिल्पकाराला हा महत्त्वाचा पुतळा कोरण्याला ४० वर्षें लागलीं असें सांगतात. दुसरीकडे सेंट पॉलचा लाईफ साईज पुतळा, हातांत नंगी तलवार घेऊन उभा आहे. चित्रकलेंतील इटालियन लोकांच्या वैभवाला ह्या शहरीं नुसता पूर आला आहे. २००० वर्षांपूर्वींच्या प्राचीन इमारतीचें अवशेष मोठ्या आतुरतेनें पाहिलें; फॅबियन अँफिथिएटर नांवाची एक अर्धवर्तुळाकार प्रचंड इमारत पाहून गतवैभवाची कल्पना आली. ह्यांत ग्लॅडिएटर नांवाच्या मल्लांचें प्राणांतिक मल्लयुद्ध होत असे. पादाक्रांत परकीय कैद्यांना (ह्यांत राजेही असत) ह्या इमारतीचें भुयारांत आणून ठेवीत असत. प्रसंगविशेषीं जनतेची करमणूक व्हावी म्हणून ह्या कैद्यांना बाहेर काढून आपसांत लढवीत असत. तो भयंकर रक्तपात पाहून प्रेक्षकजन आनंद मानीत व मल्लयुद्ध जिंकणा-यावर खुष होत. हे रोमनस्वराज्याचें लक्षण!

नेपल्स     
ता. १८ रोजीं मी नेपल्सला गेलों. ह्या बंदराचा देखावा फारच सुंदर आहे. मुंबईच्या मलबारहिलप्रमाणें, समुद्रकांठावरील एका टेकडीवरून उंच उंच एक रस्ता जातो. आपोलो बंदराप्रमाणें येथें धक्काही फार सुंदर आहे. मात्र लोकांचा विशेषतः व्हिक्टोरियावाल्यांचा अप्रामाणिकपणा वेळोवेळीं नजरेस आला. एक दोनदां तर माझ्या प्राणावरच बेतली होती. माझ्या हॉटेलांतील खिडकींतून धुमसत असलेल्या व्हेसुवियस ज्वालामुखीचा देखावा फार भीषण दिसत होता.

पाँपी     
दोन हजार वर्षांपूर्वीं भूकंपामुळें व ज्वालामुखी पर्वताच्या तप्तरसामुळें हें शहर दडपून गेलें होतें. त्याचें आतां उत्खनन होऊन त्याला आतां प्रेक्षणीय स्वरूप आलें आहे. हें नेपल्सपासून सुमारें ४।५ मैल अंतरावर आहे. हें पाहाण्यासाठीं मी ता. १९ शनिवारीं गेलों. गरम राखेचा ढीग वर पडल्यानें त्याच्या खालीं जीं माणसें, जनावरें व इतर वस्तु सांपडल्या त्यांचे हुबेहूब सांगाडे तेथील म्युझिअममध्यें दाखविण्यांत येतात. हे खरे सांगाडे नसून राखेखाली ह्यांचे जे सांचे बनले होते त्यांत प्लॅस्टर ऑफ पॅरीस ओतून उत्खननकारांनीं हे कौशल्यानें सांगाडे बनविले आहेत. कित्येक इमारतींतील भिंतीवरचे रंग व चित्रें अगदीं ताजी दिसलीं. रस्ते व दुतर्फा ओटे फरसबंदी होते. यावरून जड चाकांच्या चाको-यांच्या खोल खुणा दिसल्या. एका दिवाणखान्याच्या भिंतीवर कांहीं बीभत्स चित्रें दिसलीं त्यावरून त्या ऐश्वर्याच्या काळांत रोमन लोकांची नीति कशी खालावली होती हें कळलें. ता. २१ सप्टेंबर १९०३ रोजीं सोमवारीं नेपल्सहून रुबाँ-टीनो नांवाचे आगबोटीनें मी हिंदुस्थानांत येण्यास निघालों; व ता. ६ ऑक्टोबर रोजीं ४ वाजतां तिसरे प्रहरीं मुंबईला परत स्वदेशीं आलों.

स्वागत     
मुंबई बंदरावर कित्येक मंडळी माझ्या स्वागतार्थ जमली होती. मी विलायतेला निघाल्यावर मुंबई प्रार्थना समाजाचे उपाध्यक्ष शेट दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांनी परत आल्यावर मिशनरी म्हणून माझ्या राहण्याची स्वतंत्र सोय व्हावी व इतरही कामांची तजवीज व्हावी म्हणून प्रार्थनामंदिराचे आवारांत एक राममोहन रॉय आश्रम म्हणून तीन मजली इमारत मी येण्यापूर्वींच बांधून ठेवली होती. इमारतीच्या लगतच भगवानदास माधवदास नांवाचे गुजराथी समाजबंधु रहात होते. त्यांच्या बंगल्यांत माझ्या स्वागतासाठीं समाजबंधूंचें संमेलन झाले. डॉ. भांडारकर, चंदावरकर, माडगांवकर वगैरे मंडळी व सर्व वडील थोर माणसें हजर राहून त्यांनीं आनंदानें स्वागतपर भाषणें केलीं. माझे वृद्ध मित्र रा. दिनानाथराव माडगांवकर यांनीं माझ्या स्वागतासाठीं एक पद मुद्दाम रचलें होतें. त्यांत खालील चरण होतें -

तरुण असतां स्वार्थत्यागी तुम्ही दिसतां भले।
प्रभुवर कृपें धर्माभ्यासीं तुम्हां यश लाभलें।।
तरि तुमचिया हस्तें धर्मप्रचार बरा घडो ।
तनु मन तसें देवापायीं सदा तुमचें जडो ।।१।।

येथें माझ्या आयुष्यांतील आठवणींचा पूर्वार्ध संपला. ईश्वरकृपेनें उत्तरार्ध निघाल्यास गुरुजनांचा वरील प्रेमळ आशीर्वाद कितपत सफल झाला हें कळेल.

पदवीग्रहण

प्रकरण २४ वें  
बी. ए. मध्यें माझे ऐच्छिक विषय इतिहास आणि कायदा हे होते. माझा विशेष कल तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे असतांना लॉजिक आणि मॉरल फिलासफी, न्यायशास्त्र आणि नीतिशास्त्र हे विषय न घेतां, मी इतिहास आणि कायदा हे विषय घेतले ह्याचें कारण बी. ए. च्या कायद्याच्या पेपरमध्यें शेंकडा ६० वर मार्क मिळाल्यास फर्स्ट एल्. एल्. बी. ची परीक्षा झाली असें गणण्यांत येत होतें. म्हणून मीं या सवलतीचा फायदा घेण्यासाठीं ही निवड केली. दुसरें कारण असें कीं, माझें शिक्षण पुरें झाल्यावर कुठल्याही सरकारी नोकरींत अडकवून घेण्यापेक्षां सार्वजनिक कार्यांत पडण्याचा इरादा होता. त्यासाठीं स्वतंत्रपणें वकिली करणें भाग होतें. त्याशिवाय भावी आयुष्यांत माझा इतिहासाकडेच कल असल्याचें पुढें आढळून आलें. विचारांच्या दोन पद्धति आहेत. एक तत्त्वज्ञानाची मोघम पद्धत; तींत ज्ञात कारणावरून अज्ञात कार्याकडे जाणें आणि दुसरी ऐतिहासिक पद्धत; त्यांत ज्ञात कार्यावरून अज्ञात कारणांचा शोध करीत जाणें. दुसरी पद्धत नवी असून अधिक परिणामकारी म्हणून मला तीच जास्त पसंत पडली. पण ही पसंती पुढील शिक्षणाचे काळांत झाली.

डेक्कन कॉलेज
कायदा ह्या विषयावरील व्याख्यानें त्यावेळीं डेक्कन कॉलेजांत होत होतीं. त्यासाठीं आम्हांला फर्ग्युसन कॉलेजांतून डेक्कन कॉलेजांत जावें लागे. त्यावेळीं जनुभाऊ करंदीकर, माधव नारायण हुल्याळ इतकी मंडळी जमखंडीकरांचे शनवारांतल्या वाड्यांत राहात होती. तेथून फर्ग्युसन कॉलेजांत जाऊन तेथून डेक्कन कॉलेजांत आठवड्यांतून दोनदां पायीं चालत जावे लागे. टांग्याचें भाडें जबर पडत असल्यानें आणि त्यावेळीं पुण्यांत सायकलचा सुळसुळाट झाला नसल्यानें मला पावसांत भिजत, उन्हाळ्यांत शिजत एवढा मोठा पल्ला गांठावा लागे. पण त्याचें मला कांहीं वाटत नसे. संगमावरून होडी चालू असे. तींत बसून शेतावरून डेक्कन कॉलेजला जाण्यास एक जवळची वाट होती. एकदां असें झालें कीं कॉलेजवरून परत येण्यास रात्र पडली आणि होडी बंद झाली होती. मी एकटाच होतों. अंगावरचे सारे कपडे डोक्याला गुंडाळून मी पोहत संगमावर आलों. याचें माझे मित्रांना फार आश्चर्य वाटलें. पावसाळ्यांत नदीला पूर आल्यावर फर्ग्युसन कॉलेजपासून होळकर ब्रिजवरून डेक्कन कॉलेजांत जाऊन, परत येते वेळीं बंडगार्डनवरून यावें लागे.

निकाल
१८९७ सालीं पुण्यास प्रथम प्लेगचा कहर सुरूं झाला त्यावेळीं शाळा कॉलेजें बंद झाल्यानें, माझ्या घरच्या मंडळींना घेऊन जमखंडीस जावें लागलें. या सुमारास मुंबईस हिंदुमुसलमानांचा दंगा सुरूं झाल्यानें पुण्यास सार्वजनिक गणपतीचा उत्सव लो. टिळकांनीं राष्ट्रीय पायावर सुरूं केला. पहिल्या उत्सवाचे वेळीं पुण्यालाही हिंदुमुसलमानांचा दंगा झाला. दंगे, उत्सव प्लेग आणि प्लेगमधील अधिका-यांचे खून अशा अनेक धामधुमींत आमच्या अभ्यासाची फार आबाळ झाली. मी व माझे बरेच मित्र १८९७ सालीं बी. ए. परीक्षेंत नापास झालों. पुन्हा १८९८ सालीं माझी बी. ए. ची परीक्षां एकदाची पास झाली आणि कायद्याच्या पेपर्समध्यें फर्स्ट क्लासचे मार्क पडून फर्स्ट एल्. एल्. बी. ही परीक्षाही पास झाली.


पिळवणूक
अलिकडच्या युनिव्हर्सिटींतील परीक्षेच्या चढाओढीच्या पद्धतीचा मला पूर्ण तिटकारा आला होता. अशा पद्धतीनें जे स्कॉलर ठरतात ते पुढील आयुष्यक्रमांत मोठ्या विद्वत्तेचीं कामें कां करीत नाहींतॽ याचें कारण ऐन तारुण्यांत त्यांची अनैसर्गिक पिळवणूक व खच्ची होते. नुसत्या शर्यतीनें कोण विद्वान होईल! विद्वत्ता हा नैसर्गिक विकास आहे. शर्यतीचे घोडे आणि औताचे घोडे यांची तुलना केली तर अश्वशक्ति (Horse Power) कोणाची व कां जास्त असतें हें कळून येईल. युरोपांतल्या नाणावलेल्या ऑक्सफर्ड व केंब्रिजसारख्या जुन्या विश्वविद्यालयांतून या चढाओढीची पद्धत हिंदुस्थानइतकी हानिकारक दिसून येत नाहीं. हें जरी विलायतेंत गेल्यावर मला दिसून आलें, तरी ही पद्धत अनिष्ट आहे हें कळून येण्यासाठीं मला विलायतेला जाण्याची जरूर नव्हती. तिचे अनिष्ट परिणाम मी स्वदेशींच भोगले होते. माझा बी. ए. परीक्षेंतील शेवटचा पेपर संपल्यावर मी युनिव्हर्सिटीसमोरील पटांगणाचे भिंतीवर बसून राजाबाई टॉवरकडे तोंड करून मनापासून शिव्यांची लाखोली वाहिली. हा टॉवर म्हणजे मला प्राचीन बाबीलोनीया शहरांतील बॉल मरढॉक नांवाच्या उग्र देवतेचा पुतळाच भासला. त्या पुतळ्याच्या हातांत एक तापलेला लाल तवा असून गांवांतील मातांनीं आपल्या प्रथम जन्मलेल्या मुलांस त्यांत टाकून आहूती देण्याची चाल होती. तशीच चाल ह्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत खाईंत आपल्या पोटच्या पोरांस होरपळून काढण्याची आहे. यापुढें दोन वर्षे मी सेकंड एल्. एल्. बी. चा अभ्यास केला. श्रीमंत सयाजीराव महाराजांनी दयाळूपणे आपली स्कॉलरशिप सुरूं केली होती. पण खरे पाहतां माझें लक्ष अभ्यासाकडे मुळींच नव्हतें. ह्याला घरगुती कारणें आणि बाहेर प्लेगसारखी व्याधि तर होतीच; पण खरीं कारणें काय होतीं तें पुढें पाहूं, आणि त्यामुळें माझ्या शिक्षणांतच नव्हे तर भावी आयुःक्रमांत मोठी क्रांति घडून आली.

प्रो. मॅक्समुल्लर
ठराविक अभ्यासक्रमाची मला जरी शिसारी आली होती तरी मनांतील विचारविकासाच्या चक्रांची गति मुळींच मंदावली नाहीं. मिल्ल, स्पेन्सरच्या विचारामुळें जो बंडखोरपणा माझ्या मनांत व भोंवताली माजला होता त्यांत माझ्या आत्म्याची भूक शमवण्याची शक्ति नव्हती. नास्तिकपणाच्या वाळवंटांत मनाची तहान भागणें शक्य नव्हतें. अशा क्रांतीच्या वेळीं ज्या एका नवीन तत्वज्ञान पद्धतीची व तत्ववेत्त्याची गांठ पडली तो प्रो. मॅक्समुल्लर होय. धर्मावरील त्याची विस्तृत व्याख्यानें, भाषाशास्त्राचें अलोट ज्ञान, पौरस्त्य विचाराबद्दल त्याचीं समतोल वृत्ति आणि संस्कृत भाषेबद्दलची गाढ सहानुभूति इत्यादि गुणांनीं तो मला एक नवीनच आप्तपुरुष भासूं लागला.

रा. कळसकर
ता. १२ मे १८९८ रोजीं आमच्या बि-हाडीं बारामतीचे रा. रा. कळसकर बारामतीच्या महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आले होते. त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग हे मी ऐकूनच होतों. त्यांचें स्वतः भाषण ऐकून तर ह्यांनीं महार-मांग या खालावलेल्या जातींविषयीं किती कळकळ दाखविली, त्यांनीं काय काय केलें व आणखी किती करण्यासारखें आहे; हें सर्व मनांत येऊन मला स्वतःची मनःपूर्वक लाज वाटून तिटकारा आला. ता. २९ मे १८९८ रविवारीं सकाळीं आठ वाजतां रा. कळसकर, हुल्याळ व मी पुण्याच्या प्रार्थना समाजांतील उपासना पाहण्यास गेलों होतों. पुण्यांतल्या मंदिरांतली उपासना आजच प्रथम पाहिली, गेल्या डिसेंबरांत मुंबईच्या प्रार्थना समाजांतील उपासना पाहून मला तितकेसें बरें वाटलें नाहीं. उलट किंचित् दुराग्रह झाला होता.

प्रार्थना समाज
मंदिरांतील उपासना पाहून माझ्या मनांत मोठा पूज्यभाव उत्पन्न झाला. ह्याचें एक कारण हें कीं मुंबईच्यापेक्षां हें मंदीर फारच साधें आहे. दुसरें कारण असें कीं माझें मुंबईला प्रथमच जाणें असल्यानें तेथल्या उपासनेंत ख्रिश्चन चर्चमधल्या Prayer चा भास दिसला. माझ्यासारख्या गांवढळास नव्यानें दीक्षा घ्यावयाची असल्यास माझी खात्री आहे कीं तो मुंबईच्या भपकेदार देवळांत कधींच ती घेणार नाहीं. पुणें येथील उपासनेचे चालक सातारचे सबजज्ज रा. ब. काशीनाथ बळवंत मराठे हे होते. त्यांची प्रार्थना व व्याख्यान ह्यांनीं माझें मन फार वेधलें. ह्यावेळीं माझें मन श्रद्धेनें फार पवित्र झालें होतें. मीही सर्वांबरोबर प्रार्थनेचीं पदें अनन्यभावानें गायिलीं. येथेंही हिंदुधर्माचे निर्मळ स्वरुप दिसलें. प्रपंच साधून परमार्थ कसा करावा ह्याची रा. ब. मराठे यांनीं चित्तवेधक रितीनें फोड केली. माझी बहीण चि. जनाक्का आपल्या मैत्रिणींबरोबर प्रार्थनेसाठीं हुजुरपागेंतून आली होती. तिलाही ही उपासना फार आवडली. तिला दर रविवारीं उपासनेस जावेसें वाटलें. मलाही तसेंच वाटलें. दोन्ही भावंडांचा हा स्वतंत्र झालेला निश्चय पाहून तो अधिकच दुणावला. येणेंप्रमाणें ज्या प्रार्थना समाजाला अजाणपणें प्रथम हेटाळलें त्याकडेच लक्ष वेधलें गेलें. याप्रमाणें माझ्या अभ्यासांत बरेवाईट व्यत्यय येऊन माझी अभ्यासूवृत्ति सुटत चालली. रा. कळसकर यांचे खेड्यांतील समाजाच्या शिक्षणाचे प्रयत्न पाहून तसेंच आपण कांहींतरी करावें याविषयीं आमच्या मंडळांत चर्चा सुरूं झाली. मी, रा. हुल्याळ, शासने, कानिटकर वगैरे तासचे तास बसून वाटाघाट करूं लागलों. याबरोबरच प्रार्थना समाजाशीं माझा निकटचा संबंध येऊं लागला. समाजाच्या एका उत्सवास मी रोज जाऊं लागलों. रा. रा. गणपत भास्कर कोटकर नांवाचे एक वृद्ध पेन्शनर गृहस्थ यांचा माझा दाट परिचय घडूं लागला. त्यांच्या उपासना फार प्रेमळ असून गहिंवर आणणा-या असत. मधून मधून समाजाचे प्रचारक रा. शिवरामपंत गोखले हेही मला आपले अनुभव सांगत. त्यांच्या साधेपणाची छाप चांगली बसे. समाजाचे सेक्रेटरी रा. केशवराव गोडबोले यांचा नियमितपणा व निष्ठावंत कार्यतत्परता यांचा फार परिणाम होई. न्या. मू. रानडे आणि सर्वांत अधिक उठावदार म्हणजे परमपूज्य गुरुवर्य डॉ. भांडारकर यांचाही थोडाफार समागम घडूं लागला. समाजांत गाण्याचा पुढाकार घेणारे वृद्ध पेन्शनर गणपतराव आंजर्लेकर यांची संगत घडूं लागली. या सर्व वृद्ध मंडळीनें मला भारून टाकून माझ्या तारुण्याचा आडमूठेपणा, विचारांचा उच्छृंखलपणा व अनुभवांचा हिरवटपणा या भोव-यांतून माझी सुटका करून शुद्ध उदार धर्माच्या शांत प्रवाहांत मला आणून सोडलें.

परिचय
उत्सवांत शेवटीं प्रीतिभोजन होत असते. ते एका वर्षीं गणपतराव कोटकरांच्या राहत्या घरांत झालें. गव्हर्नरच्या बंगल्याच्या उत्तरेकडील बोटॅनिकल गार्डनजवळ शांतीकुटीर नांवाची रा. कोटकरांची साधी झोपडी आहे, तींत हें प्रीतिभोजन घडलें. मी अद्याप सभासद झालों नसतांही मला बोलावणें आलें. ह्या भोजनांत पुणें समाजांतील सर्व वृद्ध मंडळी व मुंबई समाजांतील तरुण मंडळी एकत्र जमली होती. फराळ, भजन, प्रार्थना, उपदेश, भोजन, संभाषण आणि सहल वगैरे प्रकार दिवसभर झाले. हें प्रत्यक्ष दृष्य अनुभवून समाज म्हणजे नुसती एक रविवारची सभा नसून देवाच्या कन्यापुत्रांचें एक शुद्ध कुटुंब आहे हें माझ्या प्रचीतीस आलें. समाजाविषयीं सर्व संशय व तेढ दूर झाली, विशेषतः गणपतराव कोटकर आणि सातारच्या समाजाचे श्री. सितारामपंत जव्हेरे यांच्या समागमांत समाजाचा इतिहास व तत्त्वांचा परिचय घडला.

सभासद दीक्षा
समाजाच्या पुस्तकालयांतून ब्राह्मसमाजांतील कांहीं ग्रंथ वाचावयाला मिळाले. त्यांत विशेषतः प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं सुंदर इंग्रजींत लिहिलेलें केशव चंद्रसेन यांचे चरित्र वाचून माझी चित्तवृत्ति भडकून गेली. त्यांतलें विशेष प्रकरण Baptism of Fire (अग्नि स्नान) हें वाचून तर प्रार्थना समाजाचा नुसता सभासद न होतां, आजन्म वाहून घेतलेला प्रचारक कसा होईन याची दुर्दम्य तृष्णा लागून राहिली. रात्रंदिवस तेच तेच विचार, त्याच त्याच तरुण आणि वृद्ध मंडळींच्या गांठीभेटी घडल्यानें समाजाशिवाय कांहीं दिसेनासें झालें. डेक्कन कॉलेजांत बी. ए. च्या वर्गांत असलेले श्री. नानालाल दलपतराम कवि (हल्लींचे गुजराथचे कविवर्य), न्यू इंग्लिश स्कूलचे मारवाडी जातीचे एक पदवीधर तरुण शिक्षक श्री. मोतीबुलासा, डॉ. भांडारकरांचे कनिष्ठ चिरंजीव देवदत्त रामकृष्ण भांडारकर, डॉ. वासुदेव अनंत सुकथनकर, श्रीयुत लक्ष्मणराव ठोसर वगैरे तरुण मंडळी समाजांत आडवारी वरचेवर जमूं लागली. त्यांतच कोटकरासारखी वृद्ध मंडळी मिळून मिसळून वागूं लागली. परिणाम हा घडला कीं ही सर्व मंडळी समाजाची रीतसर दीक्षा घेऊन सभासद झाली. मीही यांपैकींच होतों.

पहिली उपासना
१८९८ सालीं बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८९९ व १९०० हीं दोन वर्षे मला सेकंड एल्एल्. बी. च्या टर्म्स भरण्यासाठीं मुंबईस रहावें लागलें. त्यावेळीं मी मुंबई समाजांत दर रविवारीं जाऊं लागलों. तेथें रा. द्वारकानाथ गोविंद वैद्य, रा. वामन सदाशिव सोहोनी, रा. बा. बा. कोरगांवकर ह्यांचा परिचय झाला. त्यांपैकीं कोरगांवकर हे पोक्त असून वैद्य व सोहोनी हे तरुण होते. कोरगांवकरांचे घरीं माझे विशेष जाणेंयेणें होतें. प्रथम प्रथम पुणें समाजाच्या व्यासपीठावरून आणि नंतर मुंबईच्या व्यसपीठावरून उपासना व उपदेश करण्याची मला पाळी येई. पुण्याच्या व्यासपीठावरून मीं प्रथम उपासना चालवली त्यावेळीं उपदेशाकरितां “धाई अंतरिच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें” हा तुकारामाचा अभंग घेतला होता. डॉ. भांडारकर, रा. ब. का. ब. मराठे, केशवराव गोडबोले, शिवरामपंत गोखले इत्यादि वडील मंडळी उपासनेस हजर होती. माझा पहिलाच प्रसंग असून उपदेश फार चांगला वठला म्हणून डॉ. भांडारकरांनीं जवळ येऊन माझी पाठ थोपटली व सहृदय अभिनंदन केलें. हें वर्तमान मुंबईस कळल्यावर तेथूनही मला उपासनेच्या पाळ्या येऊं लागल्या. सुटीमध्यें जमखंडीस आल्यावर मी आमच्या घरीं दर रविवारीं सकाळीं मोठ्या थाटानें उपासना करूं लागलों. त्यावेळीं घरचीच मंडळीं नव्हे तर बाहेरील मंडळीसुद्धां जमूं लागली. मी प्रार्थना समाजाचा सभासद झालों हें माझ्या आईबाबांना फार आवडलें. हें पाहून मलाही बरें वाटलें. प्रार्थना समाज म्हणजे बाबांच्या भागवतधर्माचीच एक सुधारून वाढवलेली आवृत्ति असें त्यांना वाटूं लागलें. कारण तुकाराम, एकनाथ, रामदास ह्यांच्या अभंगाची निरूपणें उपदेशाचे वेळीं होत असल्यानें वरील गोष्टींची साक्ष पटत होती. त्यामुळें बाहेरून येणा-या मंडळींनाही हा प्रकार विशेष असा वाटला नाहीं. माझे मित्र मीरासाहेब हथरुट या मुसलमान गृहस्थास व लिंगायत, ब्राहृमण इत्यादि जुन्या मित्रांस ह्या प्रकारचें कौतुकच वाटलें.

रा. सुकथनकर
मी इंटरच्या वर्गांत असताना कोल्हापूरचे वासुदेव अनंत सुकथनकर नांवाच्या एका गरीब सालस विद्यार्थ्याची गांठ पडली. सदाशिव पेठेंत आम्ही पालकर यांचे वाड्यांत असतांना ते आमच्याच जागीं राहूं लागले. ह्यांच्याशीं फारच मैत्री जमल्यावर पुढें हेही माझ्याबरोबर प्रार्थना समाजांत जाऊं येऊं लागून शेवटीं सभासदही झाले. सन १८९५ सालीं पुण्यांस काँग्रेस भरली त्यावेळीं अमेरिकेंतील डॉ. जे. टी. संडरलंड ह्यांची पुण्यास व्याख्यानें झालीं असा वर उल्लेख आहे. अमेरिकेंतील युनिटेरियन समाजाकडून प्रतिनिधी म्हणून युरोप-अमेरिका येथील उदारधर्माच्या समाजांचे हिंदुस्थानांतील प्रार्थना व ब्राह्म इत्यादि उदारधर्माच्या समाजांशीं अधिक दळणवळण व सहकार्य करण्यासाठीं काय उपाय करावा यास्तव सूचनावजा रिपोर्ट करण्यासाठीं हे हिंदुस्थानांत आले होते. त्यांना भेटण्यासाठीं माझेबरोबर सुकथनकर हेही असत.

रा. मोतीबुलासा
सन १८९९ च्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूलचे पदवीधर तरुण शिक्षक रा. मोतीबुलासा बी. ए. ह्यांस मॅन्चेस्टर येथें हिंदी विद्यार्थी म्हणून तौलनिक धर्माच्या अध्ययनासाठीं पाठवण्याची नेमणूक झाली. विलायतेस रवाना झाल्यानंतर वाटेंत पोर्टसय्यद येथें वातज्वराचा विकार होऊन त्यांचे आकस्मिक निधन झालें. ही बातमी ऐकून पुणें व मुंबई येथील प्रार्थना समाजिस्टांना फार वाईट वाटलें. विशेषतः समाजाचे गुरुवर्य डॉ. भांडारकर यांच्या मनाला ती गोष्ट फारच लागून राहिली. मोतीबुलासाच्या दुखवट्यानिमित्त पुणें प्रार्थना समाजांत डॉ. भांडारकरांनीं एक विशेष उपासना चालविली, त्यावेळीं त्यांनीं मोठे कळकळीचे दुःखोद्गार काढले. त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रूधार चालली होती. ह्या प्रकाराचा माझ्या हृदयावर जोराचा परिणाम झाला. गुरुवर्य व्यासपीठावरून उतरतांच मी त्यांचेजवळ जाऊन, ‘मोतीबुलासाच्या निधनानें रिकामीं पडलेल्या जागेसाठीं मला जर गुरुवर्यांनीं पात्र ठरवलें तर मी विलायतेस जाण्यास तयार आहें’ असें सांगितलें. हें ऐकून गुरुवर्यास आनंदाचें भरतें आलें व त्यांनीं मला मोठ्या प्रेमानें कुरवाळलें.

अटींचा खुलासा
मॅंचेस्टर कॉलेजांत हिंदी विद्यार्थ्याला पाठवावयाचे झाल्यास त्याला ब-याच अटी असतात. अशा विद्यार्थ्याची वरिष्ठ विद्यालयीन शिक्षणांत बरीच प्रगति व्हवयाला पाहिजे असते. इतकेंच नव्हे तर ब्राह्म व प्रार्थना समाजाच्या कार्याविषयीं त्याच्यामध्यें पात्रता दिसून कांहीं थोडे बहुत कार्यही व्हावयाला पाहिजे असतें. या सर्व गोष्टीं ध्यानांत घेऊन तो विद्यार्थी ज्या भागांतला असेल त्या भागांतील सभासदांनीं आणि कार्यवाहकांनीं त्यांची एकमतानें शिफारस करायला पाहिजे. डॉ. संडरलंडच्या सूचनेनुसार अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठीं आदि ब्राह्मसमाज, साधारण ब्राह्मसमाज आणि नवविधान ब्राह्मसमाज या कलकत्त्यांतील तिन्ही शाखांच्या प्रतिनिधींची ब्राह्मसमाज कमिटी या नांवानें नेमलेली एक एक समिति आहे. वरील प्रांतिक सभासदांची शिफारस या समितीकडे जाऊन तिनें ती पसंत करावयास पाहिजे असते. विलायतेंतील ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशन ही संस्था अशा पसंत झालेल्या विद्यार्थ्यास वर्षाला १०० पौंडांची स्कॉलरशिप दोन वर्षें देत असते. पण विलायतेला जाण्याचा प्रवासखर्च या विद्यार्थ्यानें आपला आपणच पहावयाचा असतो. इतकेंच नव्हें, कॉलेजांतील शिक्षणांतून परत स्वदेशीं आल्यावर सदर विद्यार्थ्यानें ब्राह्मसमाजाच्या प्रचाराचें कार्य आजन्म करावयाचें असतें. निदान ह्या उद्देशाला विसंगत असें उदर भरण्याचें दुसरें कार्य करावयाचें नसतें. उलट अशा विद्यार्थ्याच्या योगक्षेमाबद्दल ब्रिटिश कमिटी, कलकत्त्यांतील कमिटी किंवा दुस-या कोणींही कायदेशीर हमी घेतली नसते. अशा प्रकारच्या मजकुराचा स्पष्ट छापील खुलासा विद्यार्थ्याचे हातीं देण्यांत येतो. अशा बंदोबस्तानें विद्यार्थ्याची जबाबदारी तावून सुलाखून निघते. ह्या सर्व बारीक सारीक अटींचा, माझ्या घरगुती परिस्थितीचा व होऊं घातलेल्या दुस-या एल्एल्. बी. च्या परीक्षेचा कोणताही अडथळा मनांत येऊं न देतां, किंबहुना त्याचा विचारही न करतां केवळ परमेश्वरी आदेश समजून मी गुरुवर्य भांडारकरांकडे माझा निश्चय गंभीरपणें प्रकट केला. गुरुवर्यांनींही तो तितक्याच झटक्या पटकीनें स्वीकारला.

व्यत्यय
डॉ. भांडारकरांनीं मनांत आणल्यावर प्रांतिक सभासदांची, कलकत्त्याच्या समितीची, नंतर ब्रिटिश कमिटीची व अखेरीस मॅंचेस्टर कॉलेज कमिटीची पसंती ह्या ओघाओघानेंच मिळाल्या. मध्यें एकच व्यत्यय घडला तो हा कीं, न्या. मू. रानडे यांनीं रा. परांजपे नांवाच्या दुस-या एका ब्राह्मण तरुणाची पसंती करून शिफारस केली पण त्याची निवड झाली नाहीं. कारण आतांपर्यंत समाजांशीं त्याचा संबंध जडलेला नव्हता. ह्याच परांजप्यानें पुढें वर्धा येथें हनुमानगडावर एक नवीन धर्मप्रथा काढली.

दयाळू महाराज
येथवर झालें ते ठीक झालें. पण “सर्वारंभास्तडुलाःप्रस्थमूलाः”! प्रवासखर्चाची सोय काय हा मुख्य प्रश्न येऊन पडला. निदान दीड दोन हजार रुपये तरी पाहिजे होते. याशिवाय माझा पोषाखखर्च, मी परत येईतों माझ्या परिवाराचा योगक्षेम याचीही सोय व्हायला पाहिजे होती. सर्वांत मोठी अडचण प्रवासखर्चाची होती. पण त्याहून दुसरी अडचण अशी होती कीं, माझ्या बी. ए. च्या व एल्एल्. बी. च्या परीक्षेसाठीं ५ वर्षे मला श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं सुमारें दीड हजार रुपये दिले होते. आणि मॅंचेस्टरची स्कॉलरशिप घेतल्यानें गायकवाडींतच काय पण कुठेंही नौकरी करणें अशक्य होतें. आणि ती न केल्यास घेतलेली स्कॉलरशिपची रक्कम परत करण्याचा कायदेशीर करार होता. अशा प्रचंड फिकिरींत मी पडलों. पण ईश्वरीकृपेनें मला यांतूनही एक वाट दिसली ती ही कीं श्रीमंतांकडे समक्ष जाऊन झालेला प्रकार सरळपणें निवेदन करून त्यांची मदत मागावी. त्याप्रमाणें वेळ न दवडतां महाराजांकडे बडोद्यास गेलों. भेट झाली. महाराज खरे दिलदार. ते हंसून म्हणाले, “काय शिंदे, आमच्या पैशांची काय वाटॽ” मी अत्यंत नम्रपणानें उत्तर केलें, “महाराज पत्करलेलें कार्य ईश्वराचें आहे आणि तें आपल्यास पसंत पडण्यासारखेंच आहे. धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादि प्रागतिक गोष्टींचें बाळकडू आपण आजपर्यंत पुष्कळच पाजीत आलेले आहांत. आतां तर विलायतेंतील युनिटेरीयन समाजानें माझा अर्ज पसंत केल्यावर ही चालून आलेली संधि आपण दवडणार नाहीं अशा भरंवशावरच आपणाकडे आलों. मला प्रवासास लागणारे सुमारे दीड हजीर रुपये जर आपण कृपाळूपणें द्याल तर अर्थातच माझे मागचे दीड हजार रुपयांचें ऋण फिटलें असेंच मी समजेन.” ऋण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून दयाळू महाराज हंसले आणि म्हणाले, “बरें आहे. शिंदे तुम्ही यशस्वी होऊन या.” सेकंडक्लास डेकचें जाण्यायेण्याचें भाडें देण्याची हुजुराज्ञा झाली.
हें कळल्यावर समाजाचे मित्रमंडळीस फार आनंद झाला. बाकीची लहानमोठी तयारी होण्याला फारशी अडचण पडली नाहीं. ही इतर तयारी करण्यास माझे मुंबई समाजांतील मित्र रा. कोरगांवकर यांनीं प्रामुख्यानें भाग घेतला. इतरांनीं त्यांना सढळ हस्ते मदत केली. हा बनाव सुमारें १९०० सालच्या नवंबर, डिसेंबर महिन्यांत झाला असावा. सेकंड एल्एल्. बी. च्या माझ्या चारही टर्मस भरल्या होत्या. कायदा बहुतेक वाचला होता तरी वरील दगदगीमुळें माझी खात्रीनें पास होण्याची तयारी नव्हती. परीक्षेचा फार्म भरून मुंबई युनिव्हर्सिटीकडे मीं फी देखील पाठविली होती. पण ज्या गोष्टीकडे मनापासून कल नव्हता तिची दगदग मी कसचा वाहतों. कायदा मागें पडला तो कायमचाच. त्याचें स्थान दैवी कायद्यानें पटकावलें.

आश्वासन
हा सर्व घडत असलेला महत्त्वाचा प्रकार मी माझ्या वृद्ध वडिलांस अद्याप कळविला नव्हता. याचें मुख्य कारण हा योग जमून येईल अशी मला खात्री वाटत नव्हती. शिवाय त्यावेळीं विलायतेला जाणें आणि त्यांतलेंत्यांत मागासलेल्या देशांतील माझ्यासारख्या गरीब खेडवळानें जाणें हें फारसे संभवनीय नसल्यानें आईबाबांची सहजासहजीं अनुकूलता मिळेल असें मला वाटेना. ज्या आईबापांनी व इतर बहिणभाऊ, आश्रितांनीं इतके दिवस हालकष्टांत घालवले होते व उच्चशिक्षण दुर्मिळ असलेल्या त्यावेळीं बी. ए.; एल्एल्. बी. वगैरे परीक्षा होऊन बडोद्यासारख्या संस्थानांत माझी चांगली वर्णी लागण्याचा काळ इतका जवळ आला असतांना त्या सर्वांवर निःशंक पाणी सोडून मुलानें विलायतेसारख्या दूर देशांत जाण्याचा मार्ग पत्करला आणि तोही ऐहिक स्वार्थासाठीं नसून परत आल्यावर फकिरी पतकरण्यासाठीं! हे जेव्हां आईबाबांना कळेल तेव्हां त्यांना काय वाटेल याचें दारुण चित्र मला दिसूं लागलें. शेवटीं मला जेव्हां त्यांना सर्व प्रकार कळविणें भाग पडलें तेव्हां वडिलांना धक्का बसून ते कित्येक आठवडे आजारी पडले. पण आश्चर्य हें कीं माझ्या आईनें धीर सोडला नाहीं; ती त्यांची वरचेवर समजूत घालूं लागली. आपल्या निराशेचें दुःख आवरून धरून दोघेही मी स्वीकारलेल्या मार्गांत मला यश मिळावें अशी प्रार्थना करूं लागले. इतकेंच नव्हे तर परत आल्यावर मी जें व्रत पतकरलें होतें त्यांत आपणही भाग घेऊं असे आश्वासूं लागलें. मला धन्यता वाटूं लागली. प्रत्यक्ष मॅंचेस्टर कॉलेजची टर्म १९०१ च्या आक्टोबर महिन्यांत सुरू होणार होती. तोपर्यंत ५।७ महिन्यांचा अवधि होता. या अवधींत मी पुण्याच्या किबेवाड्यांतील नूतन मराठी विद्यालयाच्या हायस्कुलांत इंग्रजी ६ व्या व ७ व्या इयत्तेंत इतिहास व इंग्रजी काव्य या विषयांचा शिक्षक म्हणून काम पत्करलें. त्यावेळीं ह्या शाळेजवळच असणा-या जमखंडीकरांच्या वाड्यांत मी राहात असें. शेवटीं सप्टंबर महिना आला. आईबाप, बहिण भाऊ, पत्नी व मुलगा ही सर्व मंडळी जमखंडीकरांच्या वाड्यांत मजबरोबर राहात होती. आम्ही सगळे मिळून मुंबईस गेलों. “पर्शिया” नांवाच्या आगबोटीनें माझा प्रवास व्हावयाचा होता. शनिवार ता. २१ सप्टंबर १९०१ रोजीं सकाळचे १०॥ वाजतां रा. कोरेगांवकराचे घरांतून निघालों; तेव्हांपासून वियोगाच्या तीव्र वेदना सुरू झाल्या. बॅलार्ड पिअरवर माझ्या आधीं बरीच मित्रमंडळी जमली होती. गुरुजन आशीर्वाद देऊं लागले. मित्रमंडळ अभिष्टचिंतन करूं लागलें. कांहींजण प्रवासांत उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करूं लागले. अशी एकच गर्दी उडाल्यामुळें मी भांबावल्याप्रमाणें झालों होतों. १२ वाजतां प्लेग डॉक्टरची तपासणी सुरूं झाली. १२॥ वाजतां मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालों. दारावर आंत सोडताना रखवालदारानें थोडासा दांडगाईचा प्रसंग आणिला. पण हिंदुस्थानांतील निदान दोन वर्षेंपर्यंत तरी ही दांडगाई अखेरची असल्यानें मीं ती कौतुकानें सहन केली. तपासणी एका मिनिटांतच आटोपली. एकदां आंत गेल्यावर जाणारांची आणि पोचविण्यास आलेल्यांची नुसती नजरानजरही होत नाहीं म्हणून दोघांसही फार वाईट वाटतें. मी मचव्यांत बसल्यावर मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघां मित्रांकडून पुन्हा भेटून जाण्याबद्दल तीन चिठ्या आल्या. पण इतक्यांत मचवा निघाल्यानें माझा नाइलाज झाला. हळू हळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरूं लागला. वियोग मूर्तिमंत पुढें उभा राहून माझ्या जिवलग माणसांची उदास व खेदमय दिसणारीं चित्रें मला एकामागून एक दाखवूं लागला. आणि अशाच कष्टमय स्थितींत मला दोन वर्षें काढावीं लागतील कीं काय अशी धास्ती पडली.

खेळकर वृत्ति

प्रकरण २८ वें
मॅंचेस्टर कॉलेजांतील विद्यार्थी पोक्त वयाचे पदवीधर व पुढे धर्मोपदेशकाचे गंभीर काम करणारे होते. म्हणून हे नेहमींच गंभीरपणानें वागत असत असें मुळींच नाहीं. ते बहुतेक खेळकर वृत्तीनें वागत. केव्हां केव्हां तर लहान मुलांप्रमाणें दंगा माजवून सोडीत.

टोयोसाकी
जपानचे एक टोयोसाकी नांवाचे आमचे वर्गबंधु असत. ते ठेंगू असून मोठे गमती होते. त्यांच्याशीं इतर विद्यार्थ्यांच्या नेहमीं चेष्टा चालत. ते कॉलेजच्या वसतिगृहांतच राहात. एकादे दिवशीं रात्रीं नाटकाला जाऊन उशिरां परत आले आणि दार ठोठावूं लागले म्हणजे दारावरील खिडकीवरून त्यांच्यावर पाणी ओतावें; तें असें कीं ते फार भिजूं नये अशाच बेतानें, असे चाळे चालत. एकदां एक अशी टूम निघाली कीं सर्वांची उंची मोजावी. टोयोसाकीला एका भिंतीजवळ उभें केलें. त्याच्या उंचीची रेघ मारण्याच्या मिषानें हात वर करून वर असलेली पाण्याची तोटी खुली केली. टायो दचकून निसटला व सर्वत्र हंशा पिकला. दर रविवारीं टोयो फार सभ्यतेचा पोशाक करी. लाँग कोट, टॉप हॅट घालून स्वारी सडकून सभ्य गृहस्थ बने. आणि शहरांतल्या मुख्य मुख्य रस्त्यावरून हिंडून येई. एकदां एका चावट मित्रानें त्याच्या पाठीवर कोटाला एक कागदाची चिठी लावली व त्यावर Chase Me Girls असे जाड अक्षरांत लिहिलें होतें. टोयो घरीं परत येईपर्यंत त्याला हें कळलेंच नव्हतें. हें पाहून मोठा हंशा पिकला.

मलूल हिंदी
कॉलेजच्या इमारतींत विद्यार्थ्यांसाठीं Common Room म्हणून एक मोठें दालन होतें. त्यांत विद्यार्थ्यांनीं मोकळेपणानें वागावें, सिगारेट्स फुंकाव्यात, खेळावें, खिदळावें असा प्रकार चाले. केव्हां केव्हां प्रोफेसरही या खोलींत येत. त्यांच्यासमोर सिगारेट्स फुंकणें, एकादी त्यांना देणें असेंही चाले. या दालनांत मध्यभागीं एक मोठें गोल मेज होतें. मी इतरांइतका खिदळत नसे म्हणून मला Meek Indian म्हणजे “मलूल हिंदी” असें नांव पडलें होतें. माझा निरुपद्रवीपणा त्यांना जणूं उपद्रवच देत होता. म्हणून सूड उगवण्यासाठींच कीं काय दोघां धटिंगणांनीं मला सपशेल उचललें, गोल मेजावर आडवें ठेवलें आणि गाणें गात, मला घाण्यासारखें फिरवूं लागले. असा वात्रटपणा केलेल्या धटिंगणाला पुन्हा पुढच्या बुधवारीं उपासनालयांत गंभीरपणें उपासना चालवतांना पाहून मला हंसें आवरत नसे. अशा चाळ्यांपासून खुद्द प्रि. ड्रमंड हे सुरक्षित नव्हते. तशांत त्यांचीं व्याख्यानें असल्यानें या चेष्टांना साहजिकच उत्तेजन मिळे.

इव्हर्ट
कॉलेजांत मी केव्हां केव्हां माझा आवडता पिवळा फेटा बांधून शमला सोडीत असे. इव्हर्ट नांवाचा एक स्कॉच विद्यार्थी नेहमींच माकडचेष्टेंत गुंतलेला असे. त्यानें हळू हळू माझा शमला ओढण्यास सुरुवात केली. फेट्याचा खालचा एक विळखा सुटला, दुसरा सुटला तरी इव्हर्टची खोडी थांबेना. सुटलेला भाग आपल्या ताब्यांत घेण्यासाठीं खालीं बाकाच्या पायाला तो गुंडाळू लागलों. असे होतां होतां माझ्या डोक्यावर एकच विळखा राहिला. सगळ्या वर्गाला हंसें आंवरेना. स्वतः प्रि. ड्रमंड यांना तिकडे न पाहिलेसें करून व्याख्यान चालवणें कठीण जाऊं लागलें. ते फार गंभीर आणि शांत गृहस्थ असूनही त्यांच्यावरचा हा हल्ला अवर्णनीय होता. माझ्या तारांबळीला उपमाच नव्हती. स्कॉच लोकांस विनोद समजत नाहीं असा समज आहे, पण हें बाळ ह्या समजाला ‘भयंकर’ अपवाद होतें. प्रोफेसर्स व्याख्यान देत असतांना देखील ह्या चावटपणाला आळा पडत नसे. प्रो. अप्टन हे कानानें बहिरे व वृद्ध होते. म्हणून ते खालीं मेजावर बसून, मुलांना नातवंडाप्रमाणें भोवतालीं घेऊन व्याख्यानें देत असत. अप्टनचें व्याख्यान चाललें असतां तें एकाग्रतेनें ऐकत असलेल्यांच्या कानांत इव्हर्टची पेन्सिल शिरून तो दचकला नाहीं असा एकही विद्यार्थी नव्हता. अर्थात् व्याख्यानापेक्षां ह्या पेन्सिलीकडेच आम्हाला अधिक लक्ष पुरवावें लागे.
लॉकेट नांवाचा एक वेल्स विद्यार्थी कुलुंगी कुत्र्याप्रमाणें ओरडण्यांत प्रवीण होता. नुसतें भुंकूनच आपली तृप्ति करून न राहतां तो केव्हां केव्हां पायाच्या पिंडरीला चावूनही आपली कुशलता प्रगट करी.

मर्कट लिला     
सिगारेट न ओढणारा विद्यार्थी काय तो मीच एकटा होतों. त्यामुळें मी सर्वांच्या डोळ्यांत सलत असें. माझी बसावयाची खोली स्वच्छ, हवाशीर व टापटिपीची असे. अर्थात् हा अपराध कॉलेजबंधूंच्या दृष्टीनें असह्य होता. चिरुटाचा धूर, सिगारेटचीं थोटकें, कागदाच्या गोळ्या वगैरेची खोलींतल्या सामानांत गणना झाली नाहीं तर ती विद्यार्थ्याची खोली कसली! एकदां चार पाच विद्यार्थी चहासाठीं न बोलावतां आले. प्रत्येकानें सिगारेटचे डबे बरोबर आणले होते. माझ्या खोलींत येऊन प्रत्येकजण धुराचे लोळच्या लोळ सोडूं लागला. खोलीं धुरानें इतकी गच्च भरली कीं जणूं काय ती बलूनप्रमाणें उडून जाते कीं काय असें वाटलें. चहा देण्यासाठी लॅंड लेडी जेव्हा आंत आली तेव्हां झालेला हा संपूर्ण प्रकार पाहून खोलीला आग लागली आहे कीं काय असें वाटून भीतीने तिनें किंकाळीच फोडली. तेव्हां कुठें या मर्कटांचा नवस फिटला.

पॉझ मॅगेझिन
उन्हाळ्याच्या सुटींत डॉ. कार्पेन्टर लेक डिस्ट्रिक्टमध्यें राहण्यास गेले. तेव्हां आम्हां सर्व विद्यार्थ्यांना १५ दिवस आपला पाहुणचार व सरोवरप्रांताची शोभा दाखवण्यासाठीं बोलावून नेलें. त्या सुट्टीच्या अनेक करमणुकींत ‘पॉझ मॅगेझिन’ नांवाचे एक तात्पुरतें हस्तलिखित पत्र विद्यार्थ्यांनीं काढलें. त्यांत कार्पेन्टर साहेबांना, “चिप,” अप्टन साहेबांना “अपी” आणि ड्रमंड साहेबांना “डमी” अशीं व्यंग नांवें देऊन त्यापुढें त्यांच्या लक्षणांचें एकएक वाक्य लिहिलें होतें.

    प्रो. कार्पेन्टरच्या नांवापुढें खालील कविता होती---
    Each day he does a mountain climb
    A ten mile row, three meals, a witciam.
    And fills the intervening time with Pali
    Texts and Hebrew Criticism.
     प्रिन्सिपाल ड्रमंड यांना पांच सुंदर तरुण मुली होत्या. त्यांच्या नांवांपुढें खालील वाक्य होतें-
      Happy is the man whose quiver is full
टोयोसाकी—
There came from far Japan
To cheer this gloomy place
A merry little man
With mischief in his face.

He Flirts like any boy
Although a married man
So we must send our Toy
Once more to far Japan.
शिंदे—
A meek and modest Indian
Who will, unless he faints,
Some day duly be worshipped
Among his country saints

He is no vulgur fraction
As single student be
But he and Mrs. Shinde
Form one integrity.

खडतर पांच वर्षें

प्रकरण ८ वें
(१८८५ – १८९०)
स्वभावदोष
येथपर्यंत आमच्या घरांतील दारिद्र्याच्या मीं आठवणी दिल्या त्या केवळ माझ्या बाबांच्या व विशेषतः आईच्या स्वभावाचें वर्णन करण्यासाठीं दिल्या. त्यांच्या स्वभावांतील दोष दाखविण्यासाठीं नव्हे. ह्या दारिद्र्याचें कारण माझ्या बाबांचा कदाचित् फार तर आळस हा असेल. पण कोणत्याही प्रकारची कोणाची फसवणूक किंवा अप्रामाणिकपणामुळें त्यांच्या उत्पन्नामध्यें आलेला तोटा हें नव्हतें. आतां ह्यापुढेंही कांहीं आठवणी द्यावयाच्या त्यांत बाबांच्या स्वभावांतले कांहीं दोष दिसतील. पण ते त्यांचे दोष नसून-निदान दोष दाखविण्याचा माझा हेतु मुळींच नसून, - माझ्या आईच्या स्वभावांतला दैवी चांगुलपणा दाखविण्यासाठींच मी केवळ त्या आठवणी देत आहें. माझ्या आईच्या सहिष्णुतेची-तिच्या स्वभावाची पारख करण्याकरितां व आम्हां मुलांच्या भावी शिक्षणाकरितां देवानें आम्हांला दारिद्र्य हा मित्र दिला. त्याबद्दल आम्ही त्याचे आभारीच आहोंत. पण त्याही पुढें आम्हां मुलांची नसली तरी आमच्या आईची पारख करण्याकरितां आम्हांवर जे दुर्धर प्रसंग आले, त्याबद्दल काय म्हणावें हें समजत नाहीं. ते प्रसंग म्हणजे माझ्या बाबांला निशा करण्याचें व्यसन लागलें हे होत ! बाबांना प्रथम गांजा ओढण्याचें व नंतर कांहीं दिवसांनीं दारू पिण्याचें व्यसन लागलें ! मी या सर्व काळांत आमचे जे हाल झाले त्याबद्दल माझ्या पूज्य व बाणेदार बाबाला मुळीच दोष देऊं इच्छित नाहीं. 

संस्थानी नोकरी
बाबा त्यांचे लहानपणापासून सुखांतच लाडांत वाढलेले. पैशांचा लोभ त्यांच्यामध्यें मुळींच नव्हता. लोभाचा इतका अभाव कीं त्यामुळें त्यांना पैशांची योग्य किंमतही कळत नव्हती असें म्हटलें तरी चालेल. त्यांचें शिक्षण बैठे आणि पांढरपेशी होतें. ही स्थिती त्यांचे अर्धे वय म्हणजे जवळ जवळ ते चाळीस वर्षांचें होईपर्यंत चालून मग त्यांना दारिद्र्य आल्यानें पुढें त्यांच्या स्वभावांत व धंद्यांत फरक पडणें कठीण झालें. जमखंडीचे यजमानाशीं ते भांडून आपण होऊनच घरीं बसले होते; व त्यावर यजमानांनीं दोन तीनदां बोलाविलें तरी गेले नाहींत. मला समजूं लागल्यावर ते म्हणत असलेले मला आठवतें कीं, आपण कोणता धंदा नोकरीशिवाय केला नाहीं व आतां नोकरीही जमखंडीच्या यजमानाशिवाय दुसरीकडे करावयाची नाहीं, असा माझा निश्चय आहे, आणि हा आग्रह मग तो बरा असो - वाईट असो त्यांनीं सोळा वर्षे चालविला. माझ्या जन्माचे सुमारास म्हणजे इ. सन १८८३ चे सुमारास त्यांनीं नोकरी सोडली. पुढें सोळा वर्षांनीं त्यांचा हा करारी आग्रह पाहून यजमान आप्पासाहेबांनीं आपणच इ. सन १८९० चे सुमारास त्यांना आपले स्टोअर - कीपरचे (हिशेबी) विश्वासाचे काम दिलें. पण दरमहा पगार दहा रुपये होता. १६ वर्षे घरीं अभिमानानें बसलेल्या नोकराला पुन्हा बोलावल्याबद्दल आप्पासाहेबांचे आभार मानायचे कीं इतक्या जुन्या अनुभवी माणसाला इतका लहान पगार दिल्याबद्दल त्यांच्या कंजुषपणाची तारीफ करावयाची हें ठरविणें कठीण. पण कांहीं असो बाबांचा हा पगार व माझी स्कॉलरशिप ह्यावर आमच्या आईनें आमच्या संसाराचें ओझें हाकललें. शिवाय ह्यावेळीं मी इंग्रजी ६ आणि ७ व्या इयत्तेत गेल्यानें मला पुस्तकांचा खर्च येऊं लागला तोही भागला. जमखंडी हायस्कुलांत शाळेची फी सातव्या इयत्तेअखेर दरमहा एकच आणा असल्यानें माझ्या दुय्यम शिक्षणांत खंड पडला नाहीं. ह्या आणीबाणीच्या वेळीं बाबांनाही नोकरी लागली नसती तर मात्र काय झालें असतें ह्याची मला नुसती कल्पनाही होत नाहीं.

व्यसनी विराप्पा
इ. सन १८९० चे सुमारास ही नोकरी लागली पण इ. सन १८८५ सालांत माझा मोठा भाऊ वारल्यापासून ह्या पांच वर्षांत माझ्या आईनें काय दुःख व कष्ट सोशिले तें आमच्या डोळ्यासमोर आहे. कारण नुसतें दारिद्र्यच नव्हे तर बाबांना निशेबाजी लागली ह्याचें तिला फारच दुःख होई. तरुणपणीं बाबांचे हातीं जेव्हां मुबलक पैसा खेळत होता तेव्हां त्यांना नुसते तंबाकुचेंही व्यसन नव्हतें. फार तर काय पानाचा विडाही ते नेहमीं खात नसत. उतारवयांत त्यांना हें गांजाचें व्यसन लागलें ह्याचें कारण त्यांची दारिद्र्य-वेदनामुळें उदासिनता आणि त्यांची किंकर्तव्यता हीच होय बाबांना पुढें पुढें कांहीं सुचेनासें झालें. अशांत त्यांच्या भाविकपणामुळें, ते आल्या गेल्या साधूजवळ, बैराग्याजवळ जाऊन बसूं लागले. अर्थात हे बैरागी म्हणजे निःसंग फिरस्ते, गांजेकसच असणार. त्यांच्या बेजबाबदार व बेपर्वाईच्या गोष्टी ऐकत बसतांना बाबांना आपल्या संसाराच्या वेदनांचा विसर पडत असावा. मग त्यांत गांजाच्या व्यसनाची भर पडण्यास काय उशीरॽ तशांत ज्या दत्त सांप्रदायाच्या ते ह्या वेळीं नादीं लागले होते; त्यांतील बरीच मंडळी आळशी, उनाड व गांजेकस होती; त्यांत विराप्पा नांवाचा एक कोष्टी गृहस्थ होता. तो स्वभावानें फार चांगला होता. तो कांहीं कानडी साधुसंतांची पदें फार रसिक त-हेनें म्हणत असे. पण त्याला गांजाचें व्यसन फार जबर होतें. तो माझ्या बाबांचा मोठा सोबती होता. माझ्या बाबांला व्यसन लागण्याचें हें एक कारण. विराप्पा तर ह्या व्यसनापायींच शेवटीं वारला. हा आपल्या मित्राचा नाश झालेला पाहून
दुस-याच्या संगतीला न लागतां माझे बाबा मात्र शुद्धीवर येऊन निवळले!

बबलादीचे सिद्ध
पण इतक्यांत बाबांना दुसरी वाईट संगत लागली. ती म्हणजे मागें सांगितलेल्या बबलादीच्या लिंगायत साधुंची. बबलादीचे हे सिद्ध पुरुष कानडी प्रांतांतले त्या काळीं बरेच प्रसिद्ध देवर्षि होते. जमखंडीच्या पूर्वेस सुमारें १२ मैलांवर कृष्णानदीचे कांठीं विजापूर जिल्ह्यांत बबलादी एक खेडेगांव आहे. त्या गावीं ह्या सिद्धांचा मठ आहे. चंद्रगिरी नांवाच्या एका देवतेचा ह्या सिद्ध घराण्याच्या मूळ पुरुषाला प्रसाद होता. ते मूळ पुरुष चांगले निःसंग साधू असावेत असे त्यांनीं केलेलीं कांहीं कानडी अनुभवी पदें या सिद्धांच्याबरोबर हिंडणारे अनुयायी म्हणत, यावरून दिसतें. ह्या सिद्धांच्या आशिर्वादानेंच पुनः नोकरी लागली अशी आमच्या बाबांची समजूत होती. बबलादीचा संप्रदाय त्या प्रांतांत तेव्हां वाढत होता. त्यांपैकीं सर्वांत वडील सिद्ध शंकराप्पा, त्यांचे चिरंजीव सदाशिवप्पा, आणि त्यांचे दोन पुतणे गंगाप्पा व शिवरुद्रप्पा असे चौघेजण आळीपाळीने कर्नाटकांत फिरतीवर भिक्षेस निघाले म्हणजे आमचे घरीं येऊन उतरत असत. शिवाय त्यांचे शिष्य पडसलगी नांवाच्या एका खेड्यांत (आईच्या माहेर गांवीं) आलगुरास तवनाप्पा नांवाचे एका पूर्वाश्रमीचें जैन जातीचे सिद्ध होते. ह्यांच्याच मार्फत बाबांचा बबलादीशीं संबंध जडला. हा इ. सन १८८९ सालीं जडला असावा. इ. सन १८९० त नोकरी लागली, हे स्वामी उघड उघड अभेद-मार्गी असत, म्हणजे जातीभेद पाळीत नसत. कोणाची पर्वा करीत नसत व निस्पृह आणि धुंद असत. पण दारू पीत व मांस खात. तुळजापूरची देवी आमची कुळदेवता तिला मांसाचा नैवेद्य जरूर लागतो. तुळजापूरचे भोपे भाऊराव कदम आमचेकडे भिक्षेला आले कीं हा नैवेद्य होत असे. शिवाय एक रामदासी ब्राह्मण संन्यासी येत. ते तर दारू व मांस दोन्हीही घेत. अशा अनेकांच्या संगतींत बाबांना दारूचीही चटक लागली व मांसाचा प्रघात आमचे घरांत पडला असावा. तरी पण आमच्या दारिद्र्यामुळें त्यांचें हें व्यसन अनावर होऊं शकले नाहीं हें एक आमच्या दारिद्र्य मित्राचें आम्हांवर मोठें उपकारच ! स्वभावांतील पालट  प्रथम प्रथम बबदालीच्या सिद्धावर माझीही चांगली श्रद्धा होती. ते घरीं आले कीं त्यांची पूजा आमचे घरीं होत असे. चहुंकडून सर्व जातीचें भक्त येत. स्वामी तुळशी कट्यावर बसत व आम्ही ताटांत कापूर ठेवून आरती म्हणत ओवाळावयाचें व त्यांच्या पायावर फुलें घालावयाचीं हीच काय ती त्यांची साधी पूजा होती. आरती झाल्यावर भक्त लोक दारूच्या बाटल्या त्यांचेपुढें ठेवीत आणि आशीर्वाद मागत. ती दारू सर्वजण पीत. त्यांत मोठा वाटा ह्या सिद्धाचा असे. दारूचा निशेंत सिद्धाच्या तोंडून जीं भविष्यवाक्यें निघत तीं खरी होत अशी भक्तांची समजूत असे. ही आरती करीत असतां मीच ताट ओवाळीत असे. व कानडींतील त्यांच्या संप्रदायाच्या आरत्या व इतरही चांगलीं पदें मी नीट चालीवर म्हणत असे. शाळेंतला माझा चांगला अभ्यास व माझी श्रद्धा व निर्व्याज वर्तन वगैरेमुळें मीही त्या सर्व साधूंना आवडत असे. पण पुढें माझी इंग्रजी हायस्कुलांतील मॅट्रीकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत जाऊन पुणे-मुंबईकडचे मला नवे वळण लागल्यावर त्या प्रांतीं सिद्धापेक्षां लोकांत माझीच प्रसिद्धी होऊं लागली. तेव्हां मात्र ही सिद्ध मंडळी मला पाहून चपापूं लागली. मी मोठा विद्वान होईन हें त्यांचे तोंडचे कानडी भविष्य मी कित्येक वेळां प्रत्यक्ष ऐकलें आहे. हें भविष्य कसेंही ठरलें असो, किंवा हे त्यांच्यावर बसलेल्या श्रद्धेचें फळ असो किंवा नसो मॅट्रिक क्लासमध्यें असतांनाच मला या सिद्धांच्या लीला आवडेनाशा झाल्या. आणि बाबांवरही माझ्या सर्व वर्तनांचा दाब बसून हें बंड आमच्या घरांतून अजिबात बंद झाले. इतकेंच नव्हे तर पुढें नोकरी लागल्यावर बाबांच्या भांबावलेल्या मनाला कांहीं व्यापार मिळाल्यामुळें म्हणा किंवा माझ्यामुळें म्हणा बाबांची निशेबाजी अगदीं बंद झाली ! इ. सन १८९१ चे डिसेंबरांत माझी मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि तेव्हां माझ्यांतच नव्हे तर माझ्या घराण्यांतही मोठाच पालट झाला !

  1. कॉलेज-प्रवेश
  2. कांहीं संवयी आणि वागणूक
  3. इंटरमिजिएटचें वर्ष
  4. आमचीं लग्नें
  • 86
  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
Page 91 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी