1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मरण म्हणजे काय?

(महर्षि देवेन्द्रनाथ ठाकूर यांच्या मृत्यूनंतर केलेला उपदेश – सु. प. १३-०८-१९०५)

एक पाहतसा एकांची दहने| सावध त्या गुणे कांरे न व्हा||१||
मारा हाक देवा भय अट्टाहासे| जव काळा ऐसे जाले नाही||२||
-तुकाराम

मनुष्यजात-सर्व प्राणिमात्रही-आज अगणित काल एकएकांचीं दहने पहात आली आहे. पण ती त्या गुणे व्हावी तितकी सावध झालेली दिसत नाही. उलट हल्लीचा दुष्काळ, प्लेग आणि बंधुघातकी संग्राम इ. मुळे ह्या जातीकडून मरणाची ‘अतिपरिचयादवज्ञा’च होत आहे असे म्हटले तरी चालेल. तथापि जेव्हा एकाद्या महात्म्याच्या मरणामुळे ह्या मरणगुरूची मुलाखत घडते, तेव्हा पुन: आश्चर्य व प्रेरणा, भय आणि बोध इ. विषयक ह्याचा प्रभाव तीव्र वेगाने भासू लागतो. ज्या गुणावरून आमचा साधाभोळा तुकोबा आम्हांला सावध करू पाहत आहे, त्याच गुणाचा उल्लेख आधुनिक पंडितशिरोमणी भट्ट मोक्षमूलर हे धर्माचे मूळ धुंडीत असताना असा करीत आहेत :- “माणसाला (प्रथम) भयाने अट्टाहासे हाक मारण्याला लावणारी, त्यास जबरीने विचार करावयाला लावणारी-जर कोणती गोष्ट असेल तर ती नि:संशय मरण ही होय, आणि जगातल्या ज्ञानाच्या अतिशय महत्त्वाच्या व अक्षय भागापैकी काही भाग मरणाच्या दर्शनामुळेच प्रथम कसा लाभला, हे आता आपण पाहू.”

पण हे मरण म्हणजे केवळ भयावहच आहे असे नव्हे, तर ते आश्चर्यावहही तसेच आहे. किंबहुना आश्चर्याची परमावधीच ही. पशुपक्षीदेखील हे आश्चर्य पाहून थक्क होतात. आपला हालताचालता सवंगडी एकाएकीच अगदी स्तब्ध झाला हे पाहून मुकी जनावरे, पण तीदेखील कशी तटस्थ राहतात आणि त्यांची ती तटस्थवृत्ती पाहूनही किती आश्चर्य वाटण्यासारखे आहे. एक जनन शिवायकरून ह्या जगतात मरणाइतके दुसरे गूढ कोडे काय असू शकेल! ह्या घडीपर्यंत तो प्राणी ह्या शरीरात ठाणे देऊन भोवतालच्या अनंत विश्वात टेहळणी करीत होता, तो आता कोठे नाहीसा झाला! तो आहे की नाही, का असून नसल्यासारखा आहे! सुखदु:खाच्या त्याच्या वेदना कशा, त्याचा अनुभव काय, त्याची स्थिती कशी? हे व असे इतर प्रश्न विचारणे सोपे आहे, पण त्यास समाधानकारक उत्तर कसे मिळणार? पुनर्जन्म, पुनरूत्थान इ. मधुर मुग्ध कल्पनांनी का खरे सांत्वन होणार आहे? आत्मा अमर आहे, ह्या उपजत श्रद्धेचे अवलंबन करू म्हटले तर तीमुळेच ना ह्या सर्व आश्चर्याला अवकाश? ती नसती तर पाण्यात विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे हे शरीर पंचत्वाप्रत पावले आणि बाकी शून्य उरले म्हणून केव्हाच स्वस्थ बसता आले असते. पण तसे नाही. शरीर नाहीसे झाले तरी काही शिल्लक रहात असावी, पण त्या काहीच्या व आमच्यामध्ये ह्या मरणाने घनघोर अंधकाराचा पडदा सोडिला आहे. इतर पडद्याच्या आड एकादा पदार्थ झाला तर तो पदार्थ नाही दिसला तरी त्याला आच्छादणारा पडदा तरी दिसतो. पण येथे पदार्थही दिसत नाही व स्वत: पडदाही दिसत नाही! ही किती आश्चर्याची गोष्ट.

पण आश्चर्य ही ज्ञानाची पहिली पायरी होय. तीव्र आश्चर्य वाटले की आपण ज्ञानाच्या आई आणि मरण ही त्या आश्चर्याची आई. ह्यावरून मरण म्हणजे केवळ भयावह नाही, केवळ आश्चर्यावह नाही, तर ज्ञानावहही आहे. ते आमच्या ठायी प्रेरणा करते, आमच्या कानात महाबोधाची फुंकर मारते! तो महाबोध कोणता म्हणाल तर मोक्षमुलर सांगतात, ‘जेव्हा एकादा आपल्यासारखाच मित्र एकाएकी गार होतो तेव्हा जवळ उभा असलेल्यास (आमच्या प्राथमिक पूर्वजास) समजून येते की पूर्वी काहीशी वस्तू त्याच्या ठायी असे ती आता येथे नाही. काहीसे निघून गेले.’ आत्म्यासंबंधी व तद्वारा सर्व धर्मसंबंधी ही आद्य श्रुती होय. स्पेन्सरसारखे समाजशास्त्री व टायलरसारखे मानवविकासशास्त्रीदेखील धर्माचे मूळ शोधीत असता हीच साक्ष देतात की धर्म साक्षात्काराचे आदी साधन म्हणजे प्राथमिक पुरूषास झालेले मरणाचे प्रथम दर्शन हेच होय. ह्यावरून मृत्यू हा आम्हांला आमच्याविषयी आत्मबोध व भोवतालच्या अनंताविषयी परमात्मबोध करून देणारा आदी धर्मगुरू होय असे होते. ज्याप्रकारे आरोग्य नाहीसे झाल्याविना आम्हांला आरोग्याची प्रतीती होत नाही त्याचप्रकारे कदाचित ह्या मरणरूपी आदिगुरूच्या साहाय्यावाचून आम्हांस आत्मप्रतीतीच झाली नसती. असो, जरी मरणाचे योगाने एवढे मोठे मोठे लाभ झाले आहेत, तथापि स्वत: मरण म्हणजे काय हा आमचा पूर्वीचा प्रश्न अद्यापि तसाच राहिला आहे!

ह्या गहन प्रश्नाचे उत्तर असे सहज मिळणारे नाही. जरी मिळालेतरी ते पटणार नाही. मरण ह्याचा खरा अर्थ समजण्यास अगोदर जीवन ह्याचा खरा अर्थ कळला पाहिजे. तो खरोखर कळणे किती कठीण आहे! हे जीवन म्हणजे काय, उगम कोठून, अंत कोठे, आधार कसा,चालक कोण, त्याचा हेतू काय वगैरे गोष्टी कळण्यास किती कठीण, जवळजवळ अशक्यच नाहीत काय? असे असून काही वेदांती म्हणतात की, हे दृश्य जीवन, हे मायिक जग, हे व्यवहारिक सत्य कळण्यास फार कठीण नाही, हे पुष्कळांस समजते पण ते गूढ ब्राह्मिक जीवन (Esoteric Advait) ते तात्त्विक जग मात्र फार थोड्या अधिकारी पुरूषांसच कळण्यासारखे आहे. पण आम्हांला तर ह्याच्या उलट प्रकार भासत आहे. केवल व अनंत अशी वस्तू ह्या विश्वात एकच असणार, अनेक केवलांची व अनंताची बुद्धीस कल्पनाही करवत नाही. म्हणून ज्ञानवादाने नुसते अद्वैत प्रतिपादणे हे आमच्या मताला मोठेसे कठीण दिसत नाही. तत्त्वज्ञानात साधारण गती झाल्याबरोबर ‘एकमेवाद्वितीयम्’ हा महासिद्धांत उघड दिसू लागतो. पण खरी अडचण येते ती ह्या दृश्य जगाचीच मीमांसा करतेवेळी, आणि तिच्यासंबंधी तर काही वेदांती ही केवळ माया आहे. पोकळ भास आहे असे सांगून थोडक्यात आटपू पाहतात. ‘ब्रह्म सत्यं’ हे कबूल पण जगत् मिथ्या हे कसे? खरा अद्वैत सिद्धांत जो सर्व विचारी मनास ग्रहण करावाच लागतो, तो कायम ठेवून जगत् जे ब्रह्माचेच कार्य, त्याची समाधानकारक मीमांसा करणे हे फार कठीण येथेच मोठा अधिकार पाहिजे. दृश्य जग म्हणजे आमच्यासारख्या जीवांच्याच जीवनाचे बनले आहे. ह्या जीवनाची मीमांसा कशी करावी? ह्याचे लक्षण काय? ह्याच्यापाशी प्रस्तुत मरणाचा कसा संबंध आहे? ‘मरणं प्रकृति: शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधै:|’ म्हणजे देही जो आत्मा त्याच्या आयुष्यात देहाचे मरण ही साहजिक घडणारी गोष्ट आणि देहाचे जीवित तोच मात्र एक विकास आहे, असे कालिदास सांगतो आणि मोक्षमूलर आपल्या पत्नीस लिहिलेल्या एका पत्रात म्हणतो, * “आम्ही तर मरणाच्या अटीवरच ह्या पृथ्वीवर जन्मतो, आणि शेवटी मरणच आम्हांस विधात्याकडे नेते” व तो आपल्या एका मित्राच्या पत्रात म्हणतो,  “मरण म्हणजे एका जीवनातून दुस-या जीवनात जाण्यासाठी एक पूल बांधला आहे.” इजिप्शियन लोकांच्या अतिप्राचीन थडग्यात जी नानाविध सामग्री आढळते त्यावरूनही असे सिद्ध होते की, ते लोक मरण म्हणजे जीवनक्रमातलाच एक विशेष प्रसंग मानीत असत. असो, पण अशा ह्या मरणाचा अधिक विचार करण्यापूर्वी विशुद्धि माग्ग नावाच्या बौद्ध ग्रंथात ८ व्या भागात मरणाचे जे दोन प्रकार सांगितले आहेत त्यांचा उल्लेख करणे बरे. ते प्रकार म्हणजे एक अकाली मरण, दुसरे साहजिक मरण हे होत. जीवनशक्तीचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच अगर तो होऊन त्याचा पूर्ण उपयोग होण्यापूर्वी बाळपणी अगर तरूणपणी जे मरण घडते ते अकाली होय. ख-या रीतीने पाहिले असता हे मरणच नव्हे, हा अपघात. येथे कर्माची काय गहन गती असते अगर दुस-या शब्दांनी म्हणावयाचे झाले, तर ईश्वरी कसली गूढ योजना असते, हे सांगणे आमच्या ज्ञानाबाहेरची गोष्ट आहे. असंख्यात बालमृत्यू झाले, अगणित अर्धवट वाढीचे तरूण गेले आणि जूलिअस सीझरसारखे किंवा जीजस ख्रिस्तासारखे पूर्ण विकासलेले महात्मेही मध्येच विराम पावले, ही सर्व अपघाताचीच कोटी. विश्वाच्या ह्या अवीट वखारीत ही अशी मोडतोड का होते, इतका कच्चाच माल तयार होऊन बाहेर आणखी कोठे व कशासाठी जातो व शेवटी ब-याचशा पक्क्या मालाची अपघाताने अशी धूळधाम का उडते ह्या गोष्टीचा खुलासा त्या एका विश्वकर्म्याशिवाय इतरांस होणे हल्लीच्या स्थितीत तरी शक्य नाही. नसो, पण ज्याअर्थी हे अपघात म्हणजे मुळी ख-या रीतीने मरणाच्या कोटीतच येत नाहीत त्याअर्थी मरण म्हणजे काय ह्याविषयी विचार करीत असता अशा अपघाताची नीट उपपत्ती झाली नाही म्हणून काही हरकत नाही. कारण ती होण्यासारखी असली तरी करू पाहणे अप्रासंगिक होणार आहे. तर आपण दुस-या व ख-या प्रकारचे मरण जे साहजिक मरण ज्याच्यासंबंधानेच कालिदासाचे व मोक्षमूलरचे उद्गार वर दिले आहेत, आणि जे म्हणजेच आमच्या मायिक अथवा दृश्य (Phenomenal) जीवनाचा अंत आणि ब्राह्मिक अथवा तात्त्विक (Nuomenal) जीवनातला एक अति महत्त्वाचा प्रसंग होय. जे मरण जुलीअस सीझरला आले नाही तरी आगस्टस सीझरला आले, जे मरण येशूख्रिस्ताला आले नाही तरी गौतमबुद्धाला आले आणि जे मरण आता आमच्या महर्षी देवेंद्रनाथाला आले आहे, त्याचविषयी आता आपण काहीसा विशेष विचार करू या.

वर म्हटले आहे की, मरणाचा खरा अर्थ कळण्यास अगोदर आपल्यास जीवनाचा खरा अर्थ कळला पाहिजे. आता आपण अशी कोणती एक वस्तू आहे ती शोधू की, जी ह्या जीवनात सारभूत आहे, की जिच्यासाठीच आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, इतकेच नव्हे तर ह्या जीवनातून आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, की जिच्यासाठीच आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, इतकेच नव्हे तर ह्या जीवनातून बाहेर गेलेल्यासही जिच्यामुळे आपण आपल्याकडे ओढीत आहो. एकदम सांगून टाकावयाचे म्हटले तर ती वस्तू प्रेम ही आहे. ह्या प्रेमाविण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे नुसते अस्तित्व मात्र उरते, तुम्ही म्हणाल प्रेमाशिवाय कर्तव्य हे क जीवनाचे अंग आहे. पण कर्तव्य म्हणजे काय? केवळ नियम पाळणे. चंद्र, सूर्य, सारी जड सृष्टी सतत नियम पाळीत आहे आणि ती म्हणजे नुसत्या अस्तित्वापलीकडे काय आहे? तुम्ही म्हणाल जाणीव हेही एक दुसरे अंग आहे, पण जाणीव म्हणजे काय? केवळ बिंबप्रतिबिंब भाव. स्वच्छ आरशातही हा भाव असतो. म्हणजे आरशात जशी बाह्य वस्तूचे प्रतिबिंब दाखविण्याची शक्ती आहे तशी मनात जी शक्ती आहे ती जाणीव आणि हा आरसा, अथवा ही प्रतिहत पारदर्शकता म्हणजे काय, तर केवळ अस्तित्व! केवळ अस्तित्वमय कर्तव्यातून जीवनमय कर्तव्यात आम्हांस कोण आणून सोडतो! एक प्रेम. केवळ अस्तित्वमय जाणिवेतून म्हणजे बिंबभावातून जीवनमय जाणीवेत अगर ज्ञानात आम्हांस कोण आणते? एक प्रेम! तर जीवनाचे खरे लक्षण आणि सार, प्रेम हेच नव्हे काय?

पण प्रेम ह्या शब्दाची व्यवहारात केव्हा केव्हा अगदी भलत्याच अर्थी योजना होत असते. एकाद्याचे एकाद्या वस्तूवर प्रेम जडते म्हणून तो त्या वस्तूचा अपहार करतो असे आम्ही म्हणतो. पण येथे जी आसक्ती जडते ती प्रेम नव्हे, तर निव्वळ क्षुधा म्हणजे प्रेमाची अगदी उलट बाजू होय. प्रेमी मनुष्याने आपल्यास एक पदार्थ आवडतो म्हणून तो गिळून बसणे, हे प्रेम नव्हे, तर त्याप्रीत्यर्थ त्याने स्वत:स अर्पण करणे हे प्रेम होय. प्रेमाच्या विषयापुढे प्रेमी आपल्या स्वत:स विसरतो किंवा त्याशी तादात्म्य पावतो म्हणावयाचा. मोक्षमूलरने आपल्या प्रिय पत्नीस लिहिलेल्या दुस-या एका पत्रात म्हटले आहे :

“आम्ही व इतर आत्मे ह्यांमध्ये जे कित्येक उपाधीचे पडदे पडले आहेत ते एकीकडे सारणे म्हणजेच प्रेम करणे होय. ईश्वराचे ठिकाणी आम्ही सर्वांचा जो ऐक्यसंबंध आहे व जो ह्या संसारात अनेक अदृष्ट कारणांमुळे तुटलेला असतो तो पुन: जोडणे म्हणजे तेच प्रेम होय.”

हे प्रेमच जीवनाचे लक्षण किंवा मुख्य हेतू होय. ह्याशिवाय जीवन हे जीवनत्वास मुकते असे वर म्हटलेच आहे. जीवनाच्या अगदी प्राथमिक कोटीतही हे काष्टातल्या अग्नीप्रमाणे गुप्त रूपाने असतेच. पशुकोटीत ते प्रथम अगदी स्थूलमानाने प्रकट होते. अत्यंत हिंस्त्र वाघीण, पण तिच्या पिलास क्षुधा लागल्याबरोबर तिला वेदना होते व आपले भक्ष्य ती त्यांच्यापुढे ठेवून आपण स्वस्थ बसते. मग मुलास जखम झाली असता मानवी आईच्या नेत्रांत अश्रू यावेत, मुलास दुखणे आले असता आईने पथ्य सांभाळावे ह्यात काय नवल? ह्या प्रकारे बालक व जननी ह्यांमधलाच द्वैताचा पडदा दूर होऊन जीवनाचे कार्य आटपते असे नव्हे तर व्यक्तीच्या जीवनाचा विकास जसजसा अधिक होतो तसतसा व्यक्ती आणि कुटुंब, व्यक्ती आणि जात, व्यक्ती आणि राष्ट्र, आणि अखेरीस व्यक्ती आणि विस्व ह्यांमधील पडदा क्रमाक्रमाने गळून पडतो. अशाप्रकारे व्यक्तीची मर्यादा अनंतत्वाप्रत पावल्यावर तिच्या आतापर्यंतच्या मर्यादित जीवनाचा शेवट अगर कळस होऊन अत:पर तिच्या अमर्याद जीवनास सुरूवात होते. मग त्या सुखाचे सोहाळे काय वानावेत! त्याला उपमा कसली द्यावयाची आहे.

तुकोबा म्हणतात :
आपुले मरण पाहिले म्या डोळा| तो जाला सोहळा अनुपम्य ||धृ||
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने| सर्वात्मकपणे भोग झाला||१||
एकदेशी होतो अहंकारे आथिला| त्याच्या त्यागे जाला सुकाळ हा ||२||
फिटले सुतक जन्ममरणाचे | मी माझ्या संकोचे दूरी जालो ||३||
नारायणे दिला वसतीस ठाव | ठेवुनिया भाव ठेलो पायी ||४||
तुका म्हणे दिले उमटुनी जगी | घेतले ते अंगी लावुनिया ||५||

ह्याप्रमाणे मरण म्हणजे मुक्तीचे द्वार. आणि ते वर म्हटल्याप्रमाणे आम्ही आपल्या डोळ्यानेही पाहू शकतो. मरण म्हणजे देहाचे विसर्जन अवश्य झालेच पाहिजे असे नाही. किंवा विसर्जन झाले म्हणूनही काही वाईट झाले असे नाही. देहीच विदेही दशा भोगीत असता देह गेला काय राहिला काय सारखेच. मरण म्हणजे मर्यादित अथवा एकदेशीय जीवनाचा अंत किंवा केवळ कळस, अथवा आत्म्याचे पूर्णपणे जागे होणे. देह व इंद्रियगण ही सर्व त्या आत्म्यास जागे करण्याचे उपाय होत. एकाद्या सार्वभौम राजेंद्रास जागे करावयाचे झाल्यास प्रात:काळी त्याची पट्टरामी येऊन प्रथम पाय चेपू लागते, कंचुकी मंदमंद वारा घालितो व बंदीजन त्याच्या पूर्वजाचे यश मंजूळ स्वरात गाऊ लागतात. पण राजेश्वर एकदाचे खडखडी जागे झाले की, बंदीजनांचे गायन व सर्व उपचार बंद होतात, मग त्याला त्या गायनाचा गोंगाट नकोसा होतो. त्याचप्रकारे आत्म्याला एकादाचा पूर्ण प्रेमबोध मिळाला की, मग त्याला ह्या मर्यादित जीवनाच्या अंथरूणात पडून रहावयास नकोसे वाटते. ही हाडाकातड्याची झोळ झुगारून द्यावीसे वाटते. इंद्रियगण व त्यांचे विषय जी जागृतीची साधने त्यांचीही त्याला जरूरी राहत नाही. एकनाथांनी मार्मिकपणे म्हटले आहे :-

*नवा ठाई फाटला झगा | तो नये तुझे उपयोगा ||
विषय भोगीत अंगा| तो मज दान पिंगळिया ||
तेणे टळेल तुझी पीडा | चुकेल मीतूपणाचा झगडा ||
स्वरूपी होईल आनंद गाढा | श्रीजनार्दन प्रसागे ||
एका जनार्दनी प्रेम बोध | प्रगट होय संवाद ||
पिंगळा भाकितसे प्रबोध | परोपकार जाणे गा राया ||
(डुगडुग्या, भजनी भारूड संग्रह.)

असो. एकूण मरण म्हणजे काही अशुभ व दु:खाचा प्रसंग नव्हे तर स्वरूपी होणार ‘गाढा आनंद’, असे एकनाथ स्वामी सांगतात. नारायणाने अंगी लावून घेतले म्हणून अनुपम सोहळा असे तुकाराम साधू म्हणतात. तोच अर्थ इंग्रजीत Restoration of union असे भट्ट मोक्षमूलर सांगतात ! पण असे मरण यावयाला आम्ही आपले जीवन कसे घालविले पाहिजे हे आता निराळे सांगावयास नकोच. गौतमबुद्धाला असे मरण अथवा निर्वाण प्राप्त झाले. आमच्या महर्षी देवेंद्रनाथालाही हेच मरण आले. प्रयत्न केल्यास आम्हा सर्वांनाही हाच निर्वाणाचा सोहळा गाजावा असा ईश्वरी संकेत आहे. जयजयकार असो त्याच्या मंगल योजनेचा !

मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना

३
(प्रार्थनामंदिर ता. २०-३-१९१०)

देवाची पूजा हे भूताचे पाळण | मत्सर तो शीण बहुतांचा ||१|
-तुकाराम

ईश्वरावर श्रद्धा बसण्यास आपण भूतमात्राचे ठिकाणी आदरबुद्धी ठेविली पाहिजे व त्यावरील भक्ती दृढ करण्यास मनुष्याशी स्नेहभाव अखंड वाढविला पाहिजे, ह्या दोन गोष्टींविषयी मागे विचार केला आहे. ईश्वराबद्दल आपल्या मनात श्रद्धा उत्पन्न होऊन त्याची भक्ती बाणल्यानंतरची तिसरी गोष्ट म्हटली म्हणजे त्याची पूजा, उपासना, आराधना करणे ही होय. म्हणजे सदैव त्याच्या इच्छेला आपली इच्छा अनुसरून राखणे हे होय. श्रद्धेचे पर्यवसान भक्तीत आणि भक्तीचे सेवेत झाले तरच ती स्थिती खरी म्हणता येईल. आता ही पूजा करण्यास गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादी पूजेच्या उपकरणांची, किंवा भव्य मंदिर, सुस्वर गायन, नामांकित वक्तृत्ववान उपासक ह्या बाह्य साधनांची, किंबहुना गहन विचार, गूढ ज्ञान, सूक्ष्म कल्पना आणि साक्षात्कार इत्यादी अंत:साधनांचीही आवश्यकता आहे असे मुळीच नाही. प्रपंचात राहून आपले नित्याचे व्यवहार करीत करीतच ईश्वरोपासना साधणे हे अगदी शक्य आहे. ‘देवाची पूजा हे भूताचे पाळणे’ असे तुकारामबुवा म्हणतात “ईश्वरावर प्रीती, पूज्यबुद्धी व अनन्यभाव ही ठेवून त्याप्रमाणे त्याचे मनाने भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे हीच त्याची खरी उपासना होय.” असे प्रार्थनासमाज सांगत आहे. म्हणून आपण आज परमार्थाचे तिसरे प्रापंचिक साधन (मनुष्यसेवेच्याद्वारे ईश्वरोपासना) कसे घडते ह्याचा विचार करू.

ईश्वरविषयक पद्ये गाऊन, ब्रह्मांडी आत्मा नेऊन मुक्तदशेप्रत जाऊन, सर्वसंगपरित्याग करून, मन निश्चल करून, ईश्वराची पूजा होईल. ईश्वरपूजेचा हा मार्ग आम्हांला नापसंत आहे किंवा कमी महत्त्वाचा वाटतो असे मुळीच नाही. पण मनुष्याची सेवा केल्यानेही (निष्कामपणे लोककल्याणासाठी झटल्याने) ईश्वरोपासना उत्तम रीतीने घडते हेच आज सांगावयाचे आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||

वगैरे नवविधा भक्तीचे सर्व प्रकार ह्या सेवाधर्मानेही घडतात. पण मनुष्याची सेवा करीत असताना त्याचा पायपोस डोक्यावर घ्यावा लागल्यामुळे अंगामध्ये जशी आणि जितकी कसलेली विनम्रता बाणते, तशी आणि तितकी मंदिरामध्ये कितीही प्रेमळ प्रार्थना ऐकल्याने बाणणार नाही. आपल्या धनदौलतीचे व इतर बडेजावीचे विस्मरण झाल्याशिवाय, मनातील ताठा व अहंभाव पूर्ण नाहीसा झाल्याशिवाय ह्या सेवासदनामध्ये मुळी शिरकावच होणे कठीण पडते मग एकदा शिरकाव होऊन सेवा करीत राहिल्यावर मन नम्र झाल्याशिवाय राहील असे होणार नाही. नम्रतेशिवाय आणखी दुसरे सेवाधर्माने मिळणारे फळ म्हणजे मनाची अखंड शांती हे होय. केवळ ज्ञानाने, अनुभवाने, तर्काने किंवा श्रवणाने मिळणारी शांती केव्हा ना केव्हा भंग पावणारी असते, पण सेवाधर्माने प्राप्त झालेली शांती अखंड आणि अभंग अशी असते. कारण, शांतीचा भंग करणा-या सर्व काही कारणांना न जुमानण्याची सवय ह्या सेवाधर्मातच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच मनाला एकाग्रता येते. ध्यान करीत असताना अंत:करण शुद्ध होते खरे, पण केवळ ध्यानाने त्यास तशी सवय लागत नाही. आत्मपरीक्षणाच्या तीव्र कसोटीस उतरण्याला सेवाधर्म हाच एक मार्ग आहे. आपण बरे करीत असताना लोक मत्सराने किंवा अज्ञानाने वाईट का म्हणतात! किंवा आपण धडधडीत वाईट करीत असताना लोक बळेच मतलबान किंवा भोळेपणाने आपले विनाकारण देव्हारे का माजवितात! ह्या दोन्ही परस्पर भिन्न अनुभवांचा विचार करून, अशा ह्या व्यर्थ निंदास्तुतीपासून आपल्याला दूर कसे ठेवावे हे सेवेशिवाय साधणार नाही. ह्यावरून सेवेमध्ये भक्तीचे नऊच नव्हे तर अनेकविध सारेच प्रकार आणि त्यांची फळेही लाभतात हे दिसून येईल.

स्वत:च्या आप्तांच्या, जातीच्या, किंवा देशाच्या उत्कर्षाकरिता झटणे हाही सेवाधर्मच होय. पण त्यामधील स्वत:चा मध्यबिंदू पुसून टाकून केवळ नि:स्वार्थपणाने जर आम्ही सेवा करू तर ती अधिक श्रेष्ठ होईल. ह्या सेवेची किंमत आणि तिचे महत्त्व तिच्या प्रमाणावर नसून तिच्या प्रकारावर आहे. म्हणजे पुष्कळ लोकांचे आपण कल्याण करीत असू, पण ते “आपले” लोक आहेत अशा भावनेने जर करीत असू तर त्याची किंमत एकाच मनुष्यावर पण नि:स्वार्थपणाने केलेल्या उपकारापेक्षा कमी मानता येईल. स्वार्थाने आणि अहंभावाने एकाद्या संग्रामात मिळविलेल्या द्ग्विजयाची किंमतही एका अनाथ विधवेस दु:खातून मुक्त करणे, निराश्रित वृद्धाची आजारात शुश्रुषा करणे, अनीतीच्या आडवाटेने अडखळणा-यास सरळ वाट दाखविणे, किंबहुना तान्हेलेल्यास पेलाभर पाणी देणे ह्या साध्या दिसणा-या गोष्टीहूनही कमी आहे.

ईश्वराची आराधना करणे म्हणजे तो मनुष्यासारखा स्तुतिप्रिय आहे, किंवा मनुष्याप्रमाणेच काही तरी इकडचे तिकडे त्याला खूष ठेवण्याची जरूरी आहे, अशातला मुळीच प्रकार नाही, किंवा वरील जे उपकाराचे प्रकार सांगितले ते वेळप्रसंग पडल्यास त्यांची फेड इतरांकडून आपणास व्हावी अशा बुद्धीने करावेत असेही नाही तर दुस-याची दु:खे आणि गरजा पाहून आपल्यामध्ये अनुकंपेची जी प्रेरणा होते, ती ईश्वरानेच केलेली एक सूचना असे समजून ती मानली पाहिजे, एरवी ईश्वराच्या स्तुतीचे उगीच अवडंबर माजवून त्याची आज्ञा न पाळल्यास त्याची उपासना केली असे कधीच होणार नाही. अशी फाजील स्तुती व तोंडपुजेपणा साधारण मनुष्यालाही आवडत नाही, मग सर्वज्ञ परमेश्वरास तो कसा गोड लागेल?

ह्या वरील विवेचनावरून प्रपंच आणि परमार्थ ह्यांमध्ये एकवाक्यता कशी आहे हे दिसून येईल. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ही निरनिराळ्या स्थळी आहेत ही जशी अडाणी समजूत आहे, तशीच प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न मार्ग आहेत, ही अडाणी समजूत आहे. हे दोन भिन्न नसून एकच आहेत.

मनुष्यजन्माची सार्थकता

(ता. ११-२-११ रोजीं केलेल्या कीर्तनाचा सारांश.)

अब तुम कब सिमरोगे राम । जिवडा दो दिनका मेजवान ।।धृ।।
गरभपनोमें हाथ जुडाया । निकल हुवा बेमान ।।१।।
बालपनोंमें खेल गमाया । तारुनपनमें काम ।।२।।
हात पाय जब कापन लागे । निकल गया अवसान ।।३।।
झूठी काया झूठी माया । आखर मौत निदान ।।४।।
कहत कबीर सुनभाई साधो । यहि घोडा मैदान ।।५।।

मनुष्यदेहामध्ये जी ह्या प्राणाची योजना आहे, ती फार थोडा वेळ टिकणारी आहे. म्हणजे जीव हा दोन दिवसांचा मेजवान म्हणजे पाहुणा आहे. पण ह्या थोड्याच अवकाशात जीवदशेच्या द्वारा चैतन्यरूपी आत्म्याचा उद्धार करावयाचा असतो. म्हणून ज्याला जाणल्याशिवाय मनाचे खरोखर समाधान होणार नाही त्या ईश्वरास होता होईल तो ओळखण्याविषयी कबीरजी आग्रह करीत आहेत. जड स्थितीत असलेली सर्व सृष्टी ईश्वराच्या कायद्याचे पालन बिनतक्रार करीत आहे. चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि तारांगण, वायू आणि वनस्पती ही सर्व ईश्वरास नमून आहेत. गर्भावस्थेत असताना मनुष्यप्राणीही इतर जड सृष्टीप्रमाणे जणू काय ईश्वराची आज्ञा ऐकण्यास तयारच असा हात जोडून असतो, पण तो बाहेर पडून स्वतंत्र झाल्याबरोबर बेईमान होतो. अखिल जडसृष्टी ईश्वराला न जाणताच जे त्याचे नियम पाळीत असते, तेच नियम समजून उमजून पाळणे ही मनुष्यपणाची थोरवी आहे. आणि एवढ्याचसाठी त्याला जीव हा पाहुणा दोन दिवस भेटावयास आलेला असतो. परंतु विपरीत प्रकार असा होतो की आयुष्याचे हे दोन दिवस लहानसहान गोष्टीत निघून जातात. बाळपण खेळात जाते आणि तरुणपण ख्यालीखुशालीत जाते, काम म्हणजे सर्वथैव तिरस्करणीय आहे असे नाही. रामदासांनी म्हटल्यारमाणे “बरे खावे बरे जेवावे । बरे ल्यावे बरे नेसावे । मनासारखे असावे । सकळ काही । ” ही बरेपणाची इच्छा (Decency) अथवा बरे असण्याची आणि दिसण्याची प्रवृत्ती काही वावगी नाही. लहान मुलाला जसा खेळ, तसा तरुण माणसांच्या ह्या कामना साहजिकच आहेत, पण एवढ्यातच त्याच्या सर्व शक्तीचा –हास व्हावा अशी योजना दिसत नाही. खेळ आणि कामना ह्यांच्या द्वारा स्वतःची ओळख करून घेऊन तिच्यायोगे सर्व विश्वाचा जो प्राण त्याची ओळख करून घ्यावयाचा मनुष्याचा थोर अधिकार आहे. आणि तो प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला स्वतःचीसुद्धा पूर्ण ओळख पटत नाही. तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ अंध अहंकार कसा असतो हे खालील पद्यात बुलाशहा ह्याने दाखविले आहे :

माटी खुद्दी करें दी यार ।।धृ।।
माटी जोडा माटी घोडा । माटीदा असवार ।।१।।
माटि माटिनु मारन लागी । माटी दे हतिहार ।।२।।
जिस माटीपर बहुती माटी । तिस माटी अहंकार ।।३।।
माटी बागबगीचा माटी । माटी दी गुलजार ।।४।।
माटि माटिनु देखन आई । माटी दी बहार ।।५।।
हंस खेल फिर माटि होई । पौंदी पाव पसार ।।६।।
बुलाशहा बुझारत बुझा । लाह शिरो भवसार ।।७।।

गाडी, घोडा, बागबगीचा आणि इतर सर्व संपत्ती हे मातीचेच निरनिराळे प्रकार, त्यांचे सेवन करण्यासाठी जे आपल्यामध्ये इंद्रियगण आहेत तेही पण मातीचेच प्रकार, म्हणून मातीच्या ढिगावर मातीचा ढीग रचण्यामध्ये ज्याप्रमाणे काही विशेष होत नाही, त्याचप्रमाणे केवळ इंद्रियसुखासाठी विषयांची रचना करण्यामध्येही अभिमान बाळगण्यासारखे काहीच नाही. केवळ डोईवर भार मात्र आहे. इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळां अशाही प्रकारचा अभिमान उत्पन्न होतो की आपणांस देव मिळाला, नुसत्या खाण्यापिण्यामध्येच गर्क होऊन आम्ही आपणांस फसवीत नाही तर केव्हा केव्हा एकादी धार्मिक पोकळ समजूत घेऊन आपण स्वतःस धन्य मानीत असतो, आणि केव्हा केव्हा परोपकाराचे कृत्य करीत असताही अशीच फसवणूक होते. हा अनुभव बाबू रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या खालील पदात सुंदर रीतीने निवेदित झालेला आहे :

गर्व माझा हरुनि प्रभु आणिली बहु लाज ।
कवण मुखे संमुख तव राहुं हा मी आज ।।धृ।।
गवसलासि तू म्हणूनी मज मी फसवी मनिंच्या मनी ।
फजित होत संसारि या करिता तुझे काज ।।१।।
कळेनाचि आमुच्या घरी वससि कुठे प्रभु तू तरी ।
कधि न तुझ्या चरणी मला लाविले राजराज ।।२।।
त्यजुनि तिला दिनरजनी माझेचि ठायी गेलो रमुनी ।
तव न वैभवी देखिले तुला विफल चक्षु काज ।।३।।

काव्याचे वाहिक आणि आंतरिक असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात बाहेरील सर्व पदार्थांचे हुबेहूब वर्णन असते, परंतु त्यात कवीचे हृद्गत दिसून येत नाही. दुस-या प्रकारात कवीने आपले अंतस्थ अनुभव निवेदिलेले असतात. चित्राचाही हाच प्रकार आहे. छायाचित्रांमधून (Photographs) चित्रकाराचा मागमूसही लागत नाही. परंतु चित्रकार, प्रेम, करुणा, वैराग्य, वीर्य, इत्यादी आपल्या अनुभवाचे जेव्हा बाहेरील एकाद्या देखाव्याच्या द्वारा चित्र काढतो तेव्हा ते वरिष्ठ दर्जाचे ठरते. चित्र आणि काव्य ह्यांचे हे दोन प्रकार ज्याप्रमाणे एकाहून एक श्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे जीवित्वाचे प्रकार आहेत. केवळ बाहेरचे भोग भोगून अथवा केवळ आपल्याच कल्पनेत दंग होऊन आपण राहिलो तर ‘तव न वैभवी देखिले तुला विफल चक्षुकाज’ असा पश्चात्ताप होणार आहे. पण जर आम्ही प्रत्येक वेळी आमच्या शुद्ध आणि पवित्र विचारामध्ये आणि आचारामध्ये ईश्वरी इच्छेचा विलास पाहू लागलो आणि संसारातील निरनिराळ्या प्रसंगी त्याचा समागम अनुभवू लागलो, तर आमचे जीवित
दुस-या प्रकारच्या चित्राप्रमाणे आणि काव्याप्रमाणे गंभीर आणि पूर्ण होईल. रविंद्रनाथांचे वरील पद हे दुस-या कोटीतले आहे. आणि ते त्यांच्या आध्यात्मिक जीविताचे द्योतक आहे.

असो. ह्याप्रमाणे ईश्वराचे वैभव पाहून ते ईश्वराचे आहे अशी मनाची भावना न होता आपण तिच्यात दंग झालेले असतो आणि डोळे असून आंधळे होतो. अशा रीतीने बाळपण आणि तरुणपण निघून गेल्यावर म्हातारपणी आपण निःसत्व होऊन पडतो. ईश्वरभजन करणे म्हणजे केवळ तोंडाने किंबहुना मनानेही ते स्मरण करणे एवढेच असते तर ते म्हातारपणी घडले असते. पण ज्याअर्थी कबीरजींनी ‘निकल गया अवसान’ असे म्हटले आहे त्याअर्थी भक्तिमार्गाचा अवसानाशी म्हणजे शक्तीशी निकट संबंध आहे असे होते. भक्ती म्हणजे प्रेममय शक्ती होय. ती नसेल तर आपली काया आणि माया म्हणजे शरीर आणि धन ही विफल होतात आणि आपले मरण मात्र खरे होते. प्रेममय शक्तिशिवाय जिवंत रहाणे म्हणजे निष्फळ आहे. केवळ शारीरिक अस्तित्व म्हणजे जीव नव्हे.

जिन प्रेम रस चाखा नहीं, अमृत पिया तो क्या हुवा ।
जिस इश्कते सिरना दिया, जुग जुग जिया तो क्या हुवा ।।१।।
औरो नसी हत तूं करे खुद अमल करता नहीं ।
दिलका कुफर टूटा नही, हाजी हुवा तो क्या हुवा ।।२।।
जब इश्कके दरयामें, गरकाव यह होता नही ।
गंगा जमना द्वारका नहाता फिरा तो क्या हुवा ।।३।।
वली पुकारे हो पिया पिया, पियाई पुकारते जिया दिया ।
मतलब हासल न हुवा रो रो मुवा तो क्या हुवा ।।४।।

ह्याप्रमाणे प्रेमरस जीविताचे मुख्य तत्व आहे. ह्या प्रेमाने ईश्वरही बद्ध आहे, तो म्हणतो :-
सुनो सकळ नारीनर, प्रेमबारी नयनसे ।
जानो मर्म मेरा सभी भक्तशुद्ध नयनसे ।।१।।
जैसे वत्स गायपास, रहे सदा आसपास ।
वैसेही मै भक्तसंग, रहता चिर दिन लिये ।।२।।
प्रेमका भिकारी मैं, खडा हूँ तुमरे द्वार पर ।
नही मिलति प्रेम भिक्षा, मुझको तुमसे प्रिय नर ।।३।।

ह्याप्रकारे ईश्वर स्वतःस प्रेमाचा भुकेलेला भिकारी म्हणवितो आणि भक्त ईश्वराचा दास म्हणवितो.

मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा ।
तूं दिवान तूं दिवान तूं दिवान मेरा ।।१।।
एक रोटी और लंगोटी द्वार तेरे पावा ।
भक्ति भावदेह आरोग्य नाम तेरा गावां ।।२।।
तूं दिवान मेहरबान नाम तेरा वारया ।
दास कबीर शरण आयो चरणलाग तारया ।।३।।

अशा रीतीची ईश्वराशी तद्रूप होणारी प्रेममय शक्ती आपल्या जीवितामध्ये उदयास आली पाहिजे आणि तिला कालावधी मुळीच लागू नये. कबीरजींनी म्हटल्याप्रमाणे हा घोडा हे मैदान अशी आपली तत्पर स्थिती जीवितामध्ये असली पाहिजे.

मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ति

४
(प्रार्थनामंदिर ता. २७-३-१९१०)

मन मनासि होय प्रसन्न | तेव्हां वृत्ति होय निरभिमान ||१||
पावोनि गुरूकृपेची गोडी | मना मन उभवी गुढी ||२||
साधके संपूर्ण | मन आवरावे जाण ||३||
एका जनार्दने शरण | मने होय समाधान ||४||

गेल्या तीन खेपेस ईश्वरावरील श्रद्धा, ईश्वराविषयी भक्ती व ईश्वराची उपासना हे तीन परमार्थ प्रपंचात राहूनच अनुक्रमे मनुष्यमात्राविषयी आदर, प्रेम आणि मनुष्याची सेवा ही करून साधता येतात हे सांगितले. आता चौथा आणि शेवटचा जो परमार्थ (मोक्ष) तोही प्रापंचिक साधनानेच कसा साध्य करून घेता येईल, हे पाहू.

वरील अभंगात एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे आपले मन आपणाला प्रसन्न करून घेतले म्हणजे मोक्षप्राप्ती झाली असा खरा अर्थ आहे. तुकारामही म्हणतात:

मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण ||
मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा ते ||
मने प्रतिमा स्थापिली | मनें मना पूजा केली ||
मने इच्छा पुरविली | मन माउली सकळाची ||
मन गुरू आणि शिष्य | करी आपलेंची दास्य ||
प्रसन्न आपआपणांस | गति अथवा अधोगति ||
साधक वाचक पंडित | श्रोते वक्ते ऐका मात ||
नाही नाही आन दैवत | तुका म्हणे दुसरें ||

मन प्रसन्न करा, तेच सिद्धीचे कारण. आपले मन हे प्रत्यक्ष दैवत आहे. त्याच्याशिवाय इतर देवतांस मनामध्ये थारा दिल्याने मनोदेवता प्रसन्न प्रपंच आणइ परमार्थ ही घडणार नाहीत, इत्यादी तुकारामाचे एकनाथाप्रमाणेच म्हणणे आहे.

एकादे आपण सत्कृत्य केले, एवढ्यावरूनच भागत नाही. त्या सत्कृत्याने आपले मन आपणांस राजी झाले पाहिजे. अखेरची गुढी उभी राहावयाची ती मनानेच उभारली पाहिजे. म्हणजे आज्ञा करावयाची ती मनाने आणि ती पार पाडल्यानंतर पसंतीही मनाकडून मिळावयास पाहिजे. मनाने सांगितले की, ठीक केले, म्हणजे झाले. इतरांना बरे वाटले नाही तरी हरकत नाही. उलटपक्षी सर्वांकडून स्तुतीचा वर्षाव चाललेला आहे, पण आपले मन प्रसन्न नाही तर प्रपंचातसुद्धा सुख होत नाही, मग ज्याला स्वर्ग म्हणतात तेथे ते कसचे होईल?

मोक्षप्राप्ती म्हणजे तो काही दूरचा प्रसंग नाही. तो पदोपदी येणारा अनुभव आहे. मागे गेलेला किंवा दूरचा प्रसंग नाही. तो पदोपदी येणारा अनुभव आहे. मागे गेलेला किंवा नंतर येणारा काळ अथवा स्थिती नव्हे, तर सर्व काळी, सर्व ठिकाणी मनाची प्रसन्नता असणे शक्य झाल्यावर प्राप्त होणारी ती दिशा आहे, अनंत युगांनी मोक्षाचा काळ येणार असे जर धरले तर ही शंका उदभवेल की, पुरातन काळी होऊन गेलेल्या साधु-संतांस मोक्षप्राप्ती झाली नाही काय?

मन प्रसन्न झाले असता जे सुख मिळते, त्या सुखामध्ये आणि परामार्थिक सुखामध्ये बिलकूल फरक नाही. आपले मन नेहमी प्रसन्न ठेवावे, ह्याबद्दल तुकारामबोवांचा असा सणसणीत उपदेश आहे:

जेणे घडे नारायणी अंतराय | होत बाप माय वर्जावी ती ||
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय | आणिक उपाय दु:खमूळ ||
न मानावें तैसें गुरूंचें वचन | जेणें नारायण अंतरे तें ||
देव जोडे तरी करावा अधर्म | अंतरे ते कर्म नाचरावे ||
आणि भगवद्गीतेंतही असें म्हटलें आहे :

‘सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज |’ नेमून दिलेली कर्तव्ये करीत असता त्यायोगे जर देव अंतरेल तर ती कर्मे सोडून द्या. तुम्हांमध्ये आणि ईश्वरामध्ये तुमचे आईबाप किंवा गुरू आड येऊ लागले तर त्यांनाही सोडा. ह्या ठिकाणी मन म्हणून जो आपला अंश आहे तो साक्षात ईश्वराचा अंश आहे असा अर्थ आहे. म्हणजे मन हा एक जीव आणि ईश्वर ह्या दोघांस जोडणारा दुवा आहे. म्हणून मन प्रसन्न होण्याच्या मार्गात जो जो अडथळा येईल तो तो काढून टाका, म्हणजे मोक्षप्राप्ती होईल. असा द्वैतवादी व अद्वैतवादी सर्व संतांनी एकमताने सिद्धांत केला आहे. साधूची गोष्ट बाजूस ठेवून आम्ही आपापल्या मनाची जरी साक्ष विचारली तरी तेही असेच सांगेल. मनाला सैरावरा धावू न देता आवरावे हे खरे, पण आवरता आवरता त्यास प्रसन्न करावे हे त्याहून खरे, ईश्वरावरील श्रद्धा, ईश्वराची भक्ती, त्याची उपासना, ह्या तीन परमार्थांनी अखेरीस आपल्या मनाची तळमळ मिटून त्याला शाश्वतीची शांती मिळते. तिचेंच नांव निर्वाण अथवा मोक्षप्राप्ती हें होय.

मंगळूर येथील काही विशेष गोष्टी

मंगळूर शहर
(सु. प. १२-१०-१९११)

प्राचीन अथेन्स शहर सात टेकड्यांवर वसलें होतें असे इतिहासकार सांगतात. एडिंबरो हेही टेकड्यांवर वसलेले आहे म्हणून स्कॉच लोक त्यास अर्वाचीन अथेन्स असे अभिमानाने म्हणतात. पण मंगळूर शहर सातांहून अधिक टेकड्यांवर वसलेले असून वरील दोन्ही अथेन्सलाही स्वाभाविक सौंदर्याने खात्रीने लाजवीत आहे. तशात पावसाळा संपून दसरा झाला की, मंगळापुरी (मंगळूर) दरवर्षी जणू उपवरच होते. प्रेक्षकांनी तिला ह्याच वेळी पहावयाला यावे. दंतकथा सांगते की, गोरखनाथाची कोणी मंगळा नावाची दासी होती, तीच आता मंगळापुरी (मंगळा + उरू = शहर = मंगळूरू) ची अधिष्ट देवता झाली आहे. तिचे मोठे जुने देऊळ शहराच्या नैर्ऋत्य कोनाला प्रसिद्ध आहे. आता देवी होऊन सर्वांना पूज्य होऊन बसलेली मंगळा ती पूर्वी गोरखनाथाची बटीक होती हे काय गौडबंगाल ! पण समजूतदार माणसेही आपल्या जिभेची जबाबदारी न ओळखता स्वेच्छेप्रमाणे काहीतरी सांगत सुटतात, मग ती जी बोलून चालून दंतकथा तिच्या जिभेला हाड कोठून असणार? कसेही असो. मंगळादेवीचे नवरात्र आम्ही येथे पोचल्यादिवशीच संपून दसरा चालला होता. पण मंगळूरचे नवरात्र सर्व हिंवाळाभर चालणार आहे. चहूंकडे हिरवेगार गवत म्हणजे अगदी मी म्हणत आहे. बहुतेक मुख्य रस्ते टेकड्यांच्या बगलांतून बोगदेवजा खणून काढलेले असल्यामुळे त्यांच्या दोहों बाजूंस ७-८ फूट उंच ज्या भिंती आहेत त्यांवरही दोन-दोन हात लांब गवताच्या झिप-या लागलेल्या व त्यांवर बारीक शुभ्र फुले लटकलेली दिसतात. शहर म्हणजे एक निबिड अरण्यच जसे. छपरावरील एकही कउल असे मिळणार नाही की ज्याला अर्धा तास सारखे सूर्यदर्शन मिळते, मग बाहेर कडक उन्हाळा का असेना! दोन घरे ओलांडली नाही तोच एक खाचर लागते व त्यात मस्तावलेला भात झुलत असलेला दिसतो. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती हे तीन धर्म, तुलव, मलिआळी, कानडी व कोकणी-शिवाय मोडक्या तोडक्या इंग्रजीचे शिंतोडे रस्तोरस्ती उडतात ते वेगळेच-अशा या ‘साडेचार भाषा”. ह्यांतून येथील सुमारे ४० हजार लोकसंख्या बहुतेक सारखीच विभागलेली आहे. असल्या ह्या विचित्र पुरीत ऐक्य पाहू जाणारा ‘तो एक मूर्खच.’ ‘सारस्वत’ आणि ‘कोकणी’ हे अगदी जवळचे जातभाई. पण त्यांच्यात अगोदरच प्रेमाचा उल्हास होता त्यात तेथे जन्मास आलेल्या संयुक्त परिषदेने फाल्गुनमासाची भर घातली आहे. जे सख्य सारस्वतांत व कोकण्यांत तेच येथील शेकडो वर्षांपूर्वी कॅथोलिक झालेल्यांत व नुकताच बाझल मिशनने बाप्तिस्मा दिलेल्या ख्रिस्त्यांत.  

ब्राह्मसमाज
अशा ह्या कोनाकोप-यातील शहरातही ब्राह्मसमाजाची स्थापना होऊन ३०-४० वर्षे झाली. कालिकतच्या बाजूने येथे आगगाडी तर अगदी अलीकडेच आली. तोपर्यंत येथे यावयाचे तर जलमार्गानेच. तोही मार्ग पावसाळ्यात चार महिने बंद व बाकीच्या आठ महिन्यांत आता कोठे सुखाचा झाला आहे. अशा अडचणीत ब्राह्मधर्माचे बी कोठून व कसे येऊन पडले व त्याचे झाड आज कसे कसे फैलावले आहे, हे एक नवलच हे. हा सर्व इतिहास फारच मजेचा आहे. तो सर्व येथे देण्यास अवकाश नाही. ह्या समाजाचा वार्षिक उत्सव नुकताच साजरा करण्यात आला. त्यात विशेष हा की, येथील मंदिर लहान असून फार जुने झालेले होते, ते वाढवून पुन्हा बांधण्यात येऊन उत्सवाचे पहिले दिवशी (सप्टेंबर ता. २९ रोजी) उघडण्यात आले. त्या दिवशी समाजाचे अध्यक्ष परमपूज्य रघुनाथय्या ह्यांनी गावातील आमंत्रित प्रत्येक जातीच्या प्रतिनिधीच्या हातांतून अक्षता जमवून मंदिराच्या चारी बाजूला टाकल्या. त्यांत पंचम जातीचाही मनुष्य होता. ब्राह्ममंदिर हे सर्व जातींसाठी आहे. म्हणून हे सर्वांच्या हातांनी शुद्ध व सर्वांच्या आशीर्वादाने धन्य झाले, असा ह्या कृतीचा अर्थ होता. जुन्या मंदिराचा संकोच येथील मंडळीला बरेच दिवस भासत होता. येथील उद्योगी सेक्रेटरी रा. के. रंगराव म्हणाले, ह्याविषयी मी किती दिवस तरी मनात खंती बाळगीत होतो. आमच्या सार्वत्रिक ब्राह्ममंदिरापेक्षा ह्या गावातील ताडीवाल्या बिल्लव लोकांची भूतस्थाने ही कितीतरी विस्तीर्ण आणि सुंदर आहेत, असा मी वेदीवर बसून  किती वेळां तरी प्रार्थनेत व उपदेशाचे वेळी आक्रोश केला होता. पण तिकडे कोणाचे लक्ष गेले नाही. शेवटी मंदिराचे बाजूवरील एका मोठ्या आंब्याच्या झाडालाच करूणा आली व ते अकस्मात मंदिराच्या मुख्यशाळेवर कोसळून पडले! मग काय विचारता मंदिराचे देवाने जणू नाकच कापले! आणि आम्हांला हे ऐसपैस नवीन मंदिर बांधावे लागले. ह्या मंदिरासाठी येथील वृद्धतरूण सभासदांनी अगदी अविश्रांत श्रम केले आहेत. आता सुमारे ३०० जण सुखाने बसून उपासना ऐकतील असा आश्रय झाला आहे. पण झालेले कर्ज फेडावयास व भोवतालचे कंपाउंड व आतील सामान विकत घेण्याला अद्यापि निदान दीड हजार रूपयांची फार नड आहे. ती भागविण्यासाठी काही तरूण मंडळी रजा घेऊन बाहेरगावी भिक्षेस निघणार आहेत. कदाचित मुंबईलाही एकादा येईल. का नये येऊ? उत्सवात नेहमीप्रमाणे सर्व प्रसंग झाल्यावर यंदा मराठीत कीर्तन झाले. येथील सारस्वत मंडळीला मराठीचा फार अभिमान वाटतो, विशेषत: बायकांना तरी गिर्वाण भाषेप्रमाणे पूज्य वाटते. म्हणून मंदिराकडे ज्यांनी कधी तोंडही फिरविले नव्हते अशा पुष्कळ स्त्रीपुरूषांची मंदिरात कीर्तनाचे वेळी गर्दी जमली होती.

नये मागे पाहो वाट फिरोनिया | दुसरा संगिया साहकारी ||

ह्या तुकाराम वचनाच्या आधारे श्रीकृष्णचरित्राचे आख्यान लावण्यात आले होते. वावगे म्हणावे तर साक्षात श्रीकृष्णाचे चरित्र तुकारामाचे गाइलेले, चांगले म्हणावे तर त्याचा निस्पृहपणा केवळ दु:सह होता. म्हणून जमलेली गर्दी बुचकळ्यात पडून घरोघर गेली.

निराश्रित साह्यकारी मंडळी
दुसरा संगिया साह्यकारी याची वाट मागे फिरून न पाहता अस्पृश्य वर्गाच्या उद्धारार्थ काम आज जवळजवळ १३ वर्षे येथील ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा.के. रंगराव हे निश्चयाने करीत आहेत. हल्ली तर त्यांनी आपला २५|३० वर्षांचा वकिलीचा धंदा गेल्या ऑगस्टात आवरून संपूर्णपणे अंत्यंजांचीच सेवा स्वीकारली आहे. ते आपल्या कुटुंबासह आता ब्राह्ममंदिरासमोरील प्रचाराश्रमात येऊन राहिले आहेत, व नावाशिवाय अनभिषिक्त प्रचारकच बनले आहेत. स्वीकारलेल्या कामात वेळोवेळी त्यांची मित्रमंडळी त्यांचे दोष काढीत आहेत, त्यांना सरसकट एकच उत्तर म्हणून आपल्या टेबलाजळील भिंतीवर ‘Fault finders will find fault even in Paradise’. हे वाक्य भव्य अक्षरांनी एका तांबड्या फळीवर कोरून ठेविलेले आहे. त्यांच्या शाळेतील हजरेपटावर ७३ पारियांच्या मुलांची नावे आहेत. रोजची सरासरी सुमारे ६० आहे. एक मुलगा शिकून शिक्षक बनला आहे. मुले २|३ मैलांवरून शिकावयास येतात, म्हणून त्यांस दोनप्रहरचे एक जेवण शाळेत द्यावे लागते. ६ हातमागांपैकी तीन चांगले चालले आहेत. पण कापडाला मागणी चांगली नाही. कारण गिरणीतील हलक्या स्वस्त दराच्या व वरून सारखेच दिसणा-या नगापुढे हातमागाच्या भरीव पण महाग कापडाचा टिकाव लागत नाही. पण एरंडी रेशमाच्या किड्यांची लागवड करण्यात रा. रंगरावांनी बरेच श्रेय व प्रसिद्धी संपादन केली आहे. कोइमतूर येथील शेतकीच्या कॉलेजातून ह्या किड्यांसाठी त्यांच्याकडे पुष्कळ मागणी येत आहे. हे रेशीम तयार करण्याचे कामी उच्च शिक्षण मिळविण्याकरिता मि. मेलोथ नावाच्या एका अनुभवी गृहस्थास रा. रंगरावांनी मिशनच्या मार्फतीने बंगाल्यातील पुसा येथील कॉलेजात पाठविले आहे. मंगळूरच्या कलेक्टरसाहेबांनी ह्या कामगिरीचे महत्त्व जाणून सरकारातून ५०० रू. देणगी देवविली आहे. रा. मेलोथ हे लौकरच परत येतील व पश्चिम किना-यावर जागजागी मिशनची ठाणी उघडण्यात आपल्यास मदत करतील अशी रा. रंगरावांना मोठी उमेद आहे. रा. रंगरावांचे सर्वांत नावजण्यासारखे व मदतीस अवश्य पात्र असे काम म्हणजे मंगळूरहून एका मैलावरील एका सुपीक टेकडीवर त्यांनी घातलेली पारियांची वसाहत होय. तेथे हल्ली १७ कुटुंबाची कशी तरी सोय झाली हे. पैकी चौघांस मात्र पक्क्या इमारती मिळाल्या आहेत. बाकी तात्पुरत्या झोपड्यात आहेत. सरकारने इमारती लाकूड फुकट दिले असल्याने व मजुरी ज्याची त्यानेच पुरवावयाची असल्याने ३६ रूपयांत एका कुटुंबासाठी एक पक्के घर मिळेल अशी रंगरावांनी सोय केली आहे. ५० रू. दिल्यास दोन कुटुंबांची कायमची सोय होईल असे घर तयार होते. एकंदर साठ कुळे राहतील एवढी जागा आहे. इकडे श्रीमंत उदार गृहस्थांचे लक्ष जाईल काय? एक मोटारगाडी म्हणजे २०० पारियांच्या झोपड्या हे रंगरावांचे कोष्टक मुंबईचा एकादा भाटिया शिकेल तर गरिबांचे कोटकल्याण होणार आहे! ह्या वसाहतीत दोन विहीरी काढल्या आहेत. दोन्हींसही गोडे पाणी लागले आहे. पैकी एकीचा खर्च सुमारे ५०० रू. अंदमान बेटातील कैद्यांकडून मि. सदाशिव पिले नावाच्या एका सदगृहस्थाने जमवून दिला आहे; म्हणून तिचे नाव अंदमान विहीर असे पडले आहे. एकूण अंदमानातील कैद्यांना हिंदुस्थानातील पारियांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे काय?

  1. मँचेस्टर कॉलेज
  2. भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना
  3. ब्रिटिश म्युझिअम
  4. ब्राह्मसमाज व आर्यसमाज
  • 95
  • 96
  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
Page 100 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी