1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मँचेस्टर कॉलेज

(सुबोधपत्रिका, ता. १७-०८-१९०२)

गेल्या ऑक्टोबरच्या ११ तारखेच्या तिस-या प्रहरी एक हिंदू विद्यार्थी मँचेस्टर कॉलेजचे दरा ठोठावीत होता. हा ह्या देशात एव्हा नुकताच आला असल्यामुळे, ह्याचे तोंडावर नवख्याचे प्रत्येक चिन्ह स्पष्ट दिसत होते. आगगाडीतून ऑक्सफर्ड विद्यापीठाचे दुरून दर्शन झाल्यापासून ह्याच्या मुद्रेत आदराची झाक कलेकलेने वाढत होती. मँचेस्टर कॉलेज पाहिल्यावर तर ह्याची भावना ह्यालाच कळेनाशी झाली! दाराजवळ पोहोचल्याबरोबर ह्यास सुंदर व सुवाच्य शिलालेख दिसला तो हा – ‘सत्य, स्वातंत्र्य व धर्म ह्यांस वाहिलेले!’ हे बाणेदार ब्रीद ह्यास पुढे कॉलेजातील भोजनालयाच्या व पुस्तकालयाच्या दारावरही कोरलेले दिसले. काही वेळाने देवडीवाल्याने ह्यास आत नेले. थोड्याच वेळाने वयाने व त्याहून अधिक विद्येने वाकलेली एक लहानगी आकृती ह्याजपुढे आली. अर्थात ती परमपूज्य डॉ. प्रिन्सिपॉल ड्रमंडसाहेबांचीच होती. भर्तृहरीच्या लक्षणाप्रमाणे हे खरोखरीच ‘नम्रत्वेनोन्नमंत: संत:’ आहेत, ह्यात अतिशयोक्ती अगर पक्षपात लेशमात्र नाही. ह्यावरही ज्यास वरील वचनाची शंका येत असेल, त्याचेच कमनशीब म्हणावयाचे! प्रिन्सिपॉलसाहेबांनी ह्या परक्या विद्यार्थ्याचे इतक्या कळकळीने स्वागत केले की, जणू ह्याची व त्यांची फार दिवसांची ओळख आहे. असो! पण हा हिंदू विद्यार्थी ह्या विलायतेतील धार्मिक कॉलेजाचे दार ठोठावीत का उभा आहे! भरतभूमी एकेकाळी सुवर्णभूमी होती, पण आता दुष्काळाचे माहेरघर झाली आहे म्हणून काही हिंदू विद्यार्थी कायदे, कला इ. ऐहिक विषय शिकण्यास इकडे आल्यास ते येणे साहजिक आहे. पण धर्माबद्दल आर्यांच्या कीर्तीचा नगारा परके देशांतदेखील हल्ली वाजत असता हा वेडा पीर येथे का? आर्यांच्या वंशजास बापुडे मँचेस्टर कॉलेज धर्म तो काय शिकविणार? काही दृष्टीने ही शंका अगदी यथार्थ आहे. धर्म ही बाब मुळी पढिक शिक्षणाची नव्हेच. येथे परमेशवरच गुरू, विश्व हीच शाळा आणि सृष्टी हेच पुस्तक, हे कोण सूज्ञ नव्हे म्हणेल? मनुष्य काय मनुष्यास धर्म देणार! ह्या दृष्टीने पाहता जेथे धर्म नाही, तेथे तो उत्पन्न करण्याचा स्वत: मँचेस्टर कॉलेजचाही इरादा नाही. दुस-या दृष्टीने पाहता धर्मशिक्षणात प्राणायाम कसा करावा, श्राद्धमंत्र कसे म्हणावेत, अगर बाप्तिस्मा अथवा होली कम्यूनियन कसे घ्यावे वगैरे प्रकारच्या गोष्टी येत असल्यास आर्यांच्या वंशजांस धर्म शिकविण्याची गोष्ट तर एकीकडेसच राहो, पण येथील ख्रिस्त्यांसही असला लौकिक ख्रिस्तीधर्म शिकविण्यास मँचेस्टर कॉलेज केवळ नालायक आहे, आणि ह्या नालायकीबद्दल कॉलेजास मुळीच वाईट वाटत नाही. ज्या धर्माचे उपदेशक तयार करण्यास्तव ह्या कॉलेजाची योजना आहे त्या धर्मातच अशा गोष्टीस थारा मिळत नाही. तर ह्या वरील कला शिकू इच्छिणारांनी मँचेस्टर कॉलेजाच्या वाटेस जाऊ नये हेच बरे! धर्माची देणगी देवाने माणसास आधीच देऊन ठेविली आहे व हल्लीही दरघडी तो ती देत आहे. पण ह्या बीजरूपी देणगीची लागवड करणे हे माणसाचे काम आहे आणि त्यातच दात्याने दिल्याचे चीज होणार आहे. देव देतो म्हणून गुडघ्यात डोके खुपसून बसणे केवळ नेभळेपणाचे लक्षण आहे. उत्तरोत्तर विकास पावणा-या मानवी शक्तीच्या साहाय्याने व बदलणा-या परिस्थितीस अनुसरून, श्रेष्ठाने कनिष्ठांस, जाणत्याने नेणत्यांस, पवित्राने पतितांस ह्या देणगीचा फायदा दिला नाही आणि स्वत: आपल्यामध्ये ती वाढविली नाही, तर धर्माची मूळज्योत विझली आहे असे समजावे. ह्या शुद्ध बुद्धीच्या काळात श्रद्धेची बाजू उदार धर्माने बरीच राखिली आहे. आणि शुद्ध बुद्धीच्या पायावर धर्मशिक्षण येथल्याप्रमाणे इतर थोड्याच ठिकाणी मिळत असेल. ह्या कॉलेजातून विद्यार्थी बाहेर पडल्याबरोबर त्याच्या अंगी धर्माचा दिग्विजय करण्याची पात्रता येते असा मुळीच अर्थ नव्हे. ती त्या त्या व्यक्तीच्या बळावर अवलंबून आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, श्रुतिग्रंथ, तुलनात्मक टीका, धर्मोपदेश आणि शुद्ध खासगी वर्तन इ. अकद्वारा धर्मशिक्षणाचे काम हे कॉलेज नि:पक्षपाताने, कळकळीने, दक्षतेने, धैर्याने आणि शांतपणे बजावीत आहे. आर्याचा वंशज असो की आफ्रिकेतील शिद्दी असो, कॉलेजाची द्वारे दोघांसही सारखीच उघडी आहेत. दोघांसही शिकविण्यास कॉलेजाचा अधिकार आहे. शिकणा-यात शिकण्याचीच पात्रता आहे की नाही ही शंका शोभेल, पण वरील शंका शोभत नाही.

ह्यावरून इतके तरी दिसून येईल की, हा हिंदू विद्यार्थी येथे आला ही काही वावगी गोष्ट झाली नाही. तशात ह्या कॉलेजात आलेला हा पहिला विद्यार्थी नव्हे. ह्याचेमागे तीन विद्यार्थी येथे आले असून ते आता बंगाल्यात धर्मप्रचाराचे काम मोठ्या आस्थेने बजावीत आहेत. शिवाय हल्ली जपानातूनही एक जपानी विद्यार्थी ह्याच हेतूने ह्या कॉलेजात उदार धर्माचे शिक्षण मिळवीत आहे. ह्या सुधारलेल्या शतकात केवळ भौतिक सुधारणाच होत आहे, जडवाद माजत आहे, धर्माची ग्लानी होत आहे वगैरे निराशेचे उद्गार शहाण्या लोकांच्या तोंडातूनही कधी कधी ऐकू येतात, ते केवळ त्यांचे लक्ष ह्या नवीन धर्मजागृतीकडे जावे तितके न गेल्यामुळेच होय. १९ व्या शतकापासून सर्व सुधारलेल्या जगात धर्मविचार, आचार आणि संस्था ह्यांत जी हळूहळू उत्क्रांती घडत आहे, तिची लाट हिंदुस्थानातही ब्राह्मसमाजाच्या रूपाने उसळली आहे. अर्थात निरनिराळ्या ठिकाणी उदात्त हेतूने प्रेरित होऊन काम करणा-यांमध्ये परस्पर सहानुभूती उत्पन्न होणे साहजिक आहे, आणि वर सांगितल्याप्रमाणे ह्या कॉलेजात पूर्वेचा व पश्चमेचा जो संबंध घडत आहे तो ह्या सहानुभूतीचाच परिणाम होय. अशा रीतीने परस्परांस परस्परांची नीट समज पडून, सर्वात एकच तत्त्व मंगलकार्य घडवीत आहे ह्याची प्रचीती पटली, परमेश्वराने समग्र मानवजातीस जगाच्या इतिहासात जो वारंवार उपदेश केला आहे, जे पवित्र आत्मे पाठविले आहेत व जो अनुभव दिला आहे ती सर्व जगाची समाईक संपत्ती आहे. तिचा माझे तुझे न करता गोडीगुलाबीने उपभोग घेण्यास आम् शिकलो तर वावगे होईल काय? मँचेस्टर कॉलेज तर ह्याहून दुसरे काही शिकवीत नाही. अशा उदार प्रयत्नाने जर का एकाद्या धर्माच्या संस्थेस खरोखरच धक्का पोहोचत असेल, तर ती संस्था चोरांच्या किल्ल्याप्रमाणे जितक्या लवकर ढासळेल तितके बरेच म्हणावयाचे ! आणि ती तशी ढासळल्यास चोरांशिवाय इतरांस वाईटही वाटणार नाही !!  

पम धर्माशी ज्या गोष्टींचा मुळीच संबंध नाही अशांमुळे ख-या धर्माच्या मार्गात ह्या सुधारलेल्या काळात अद्यापिही अडथळे येत आहेत. आमचा देश बोलून चालून पुराणप्रिय, अवजड आणि न हालणारा. परंतु वा-याच्या वेगाने प्रगतीच्या वाटेने धावणा-या इकडील राष्ट्रांत तरी काय विशेष आहे! सबंध युरोपात मँचेस्टर कॉलेज हे एकच आणि तेही एकलकोंडे. पाखांड्यांचे कॉलेज म्हणून त्यावर जो एकदा शिक्का बसला आहे तो अद्यापि पुसला गेला नाही. ऑक्सफर्डच्या विद्यापीठात नावडतीच्या पोराप्रमाणे त्याची हेळसांड होत आहे. ह्या सोवळ्या युनिव्हर्सिटीत अद्यापि ह्या कॉलेजाचा विटाळ खपत नाही. तथापि सुधारणेची साथच अशी काही तीव्र आहे की, ह्या कॉलेजची उदरा मते नकळतच इंग्लंडच्या सा-या चर्चमधून झिरपत आहेत! त्यामुळे युनिटेरिअन धर्माचा प्रसार दलदलीत पडलेल्या पावसाप्रमाणे, वर दिसावा तितका दिसत नाही. धर्माच्या इतर कॉलेजांतील अध्यापकांस व विद्यार्थ्यांसही ख्रिस्ती शकाच्या तिस-या व चवथ्या शतकांत मतांचे जे एकदा जुने नमुने ठरून गेले आहेत त्यांप्रमाणे आपला विश्वास आहे अशी उघडपणे प्रतिज्ञा घ्यावी लागते. असल्या फार्सात ह्या कॉलेजास काही करमणूक वाटत नसल्यामुळे ते येते घडत नाहीत. ह्या कॉलेजाबाहेर उदार मतच नाही असे म्हणणे म्हणजे ब्राह्मसमाजाबाहेर हिंदुस्थानात सुधारणाच नाही असे म्हणण्याप्रमाणे चुकीचे होईल. पण आधुनिक शास्त्रास व तत्वज्ञानास पटेल अशा प्रकारचे धर्माचे उदार मत उघडउघड प्रथिपादणे ह्या समाजाच्या सर्व दर्जात ते पसरविण्यास उपदेशक व आचार्य तयार करणे हे काम मात्र ह्याच एका कॉलेजात होत आहे.

कॉलेज म्हणजे ५-७ प्रोफेसर असावयाचे. त्यांनी एकाद्या युनिव्हर्सिटीत होणा-या परीक्षांकरिता दरसाल २००-३०० विद्यार्थ्यांस ठराविक पुस्तकातील विषयात ठराविक पद्धतीने तयार करावयाचे, व शिकणा-यांनीही परीक्षेच्या धोरणाने संधान बांधावयाचे, इ. इ. कल्पना आमच्या लोकांच्या मनांत साहजिक येतात, पण वरील कॉलेजाचा ह्या कल्पनांशी फार थोडा मेळ बसतो. हे कॉलेज मागे सांगितल्याप्रमाणे केवळ धार्मिक अध्यापनाकरिता असून ह्याचा बहाणा अट्टल सुधारकी असल्यामुळे कोणत्याही बुढ्ढ्या युनिव्हर्सिटीस ह्याचा संसर्ग सोसत नाही (आणि ह्या कॉलेजासही त्याविषयी पर्वा नाही) म्हणून अर्थात कॉलेजातील अध्ययनाचा युनिव्हर्सिटीच्या परीक्षांशी कसलाही संबंध नाही. शिवाय कॉलेजाचा उद्देश उमेदवारांस सुधारकी पदव्या देण्याचा नसून, उदार व जिवंत धर्माचा समाजात सतत प्रसार करण्यासाठी दरवर्षी ताज्या दमाच्या तरूण उपदेशकांचा पुरवठा करण्याचा आहे.

अठराव्या शतकात युरोपात आधुनिक शास्त्राचा बहार अगदी नवा होता. तेव्हा जुना धर्म व नवे शास्त्र ह्यांमध्ये मोठा लढा पडला होता. ह्या दोहोंमध्ये कधी समेट होणे शक्य नाही अस सुशिक्षितांना वाटू लागले होते. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हेच धर्माचे लक्षण आणि जड वस्तू व जड चमत्कार ह्यांची वरवर मीमांसा करणे हीच काय ती शास्त्राची इतिकर्तव्यता असा जोपर्यंत समज आहे, तोपर्यंत वरील दोन्ही तत्त्वे परस्परविघातक आहेत अशी तर्कप्रिय माणसास भ्रांती पडणे अगदी साहजिक आहे. पण मँचेस्टर कॉलेजच्या संस्थापकांना तर्कच केवळ प्रिय नव्हता आणि वरील दोन्ही तत्त्वांची विलक्षण लक्षणेही त्यांना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगी म्हणजे इ. स. १७८६ साली हे कॉलेज काढले. वास्तविक पाहता ही संस्था इ. स. १७५७ साली वॉरिंगटन अँकॅडमी ह्या नावाने वॉरिंगटन येथे स्थापना झाली होती, हिचे पुढे स. १७८६ साली मँचेस्टर कॉलेज असे रूपांतर झाले. ह्या क्रांतीच्या काळी संस्थापकांचा धर्म व शास्त्र ह्या दोहोंवरही सारखाच विश्वास होता. म्हणजे ह्यांचा धर्म शास्त्रीय होता व ह्यांचे शास्त्र धार्मिक होते. म्हणूनच केवळ असली अद्वितीय संस्था तशा काळी उद्भवली. जुना धार्मिकपणा व नवी रहाटी ह्या दोन कुबड्यांवर चालू पहाणारे सभ्य गृहस्थ हल्लीच्या प्रगतीच्या काळीही काही कमी सापडतील असे नाही, पण ह्या कॉलेजच्या चालकांच्या अंगी तेव्हापासून आतापर्यंत आपल्या पायांवरच कुबड्यांच्या साहाय्यावाचून चालण्याइतकी सचोटी आणि बळ ही दोन्ही आहेत, इतकेच नव्हे, तर व्यायामामुळे ही दोन्ही सारखी वाढत आहेत. वॉरिंगटन अँकॅडमीतील धर्मशास्त्राचे (Theology) पहिले अध्यापक (१७५७-१७६१) डॉ. जॉन टेलर हे वर्षारंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी खालील चार तत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनांवर पूर्ण ठसवीत असत:-

(१) सत्यदेवतेच्या नावाने मी तुम्हास बजावितो की, तुम्ही आताच्या व पुढच्या धर्माध्ययनात, श्रुतिग्रंथांतील साधकबाधक प्रमाणे आणि तुमची स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी ह्या दोहींकडे दक्षतेने, निःपक्षपाताने व कसोशीने नेहमी लक्ष  पुरवा, कल्पनेचा झपाटा आणि निराधार तर्क ह्यासंबंधी सावध असा;

(२) मी प्रस्थापिलेले कोणतेही तत्त्व अगर विचार ह्यांचा जो भाग तुम्हांस सप्रमाण दिसेल, त्यापेक्षा अधिक मुळीच पत्करू नका;

(३) मी हल्ली शिकविलेले व तुम्ही मानलेले कोणतेही तत्त्व तुम्हांस पुढे कच्चे अगर खोटे दिसेल, तर त्याबद्दल शंका बाळगा किंवा ते मुळीच टाकून द्या;

(४) आपले मन नेहमी मोकळे ठेवा, दुराग्रह व पक्षाभिमान ह्यांस थारा देऊ नका, आणि दुस-याच्या हक्काच्या आड तुम्ही जाऊ नका.

ही आरंभीच्या अध्यापकांची गोष्ट झाली. मध्यंतरी डॉ. मार्टिनो ह्या कॉलेजात पुष्कळ वर्षे अध्यापक होते. त्यांचे स्वतःचे धार्मिक अध्ययन ह्याच कॉलेजात झाले होते. इ. स. १८९७ साली त्यांचे ह्या कॉलेजातील अध्ययन संपून बरोबर ७० वर्षे झाली, म्हणून कॉलेजकमिटीने त्यांस अभिनंदनपत्र पाठविले, त्यास पाठविलेल्या उत्तरात मार्टिनोचे खालील सुंदर उद्गार आहेत :-

“ह्या कॉलेजने मला एक बोध दिला आहे, तो हा की मी नेहमी शिकत रहावे, आणि शिकवीत असताना तर विशेषेकरून शिकत असावे. हा बोध मजमध्ये पूर्णपणे बिंबला नसेल, तर माझा हा ७० वर्षांचा संबंध ह्या प्रगमनशील कॉलेजास, एकाद्या रिकामा पगार खात शिलकेत पडलेल्या पेन्शनदाराप्रमाणे, केवळ भारभूत झाला असेल. कॉलेज-शिक्षकांचा मी एका गोष्टीविषयी अत्यंत ऋणी आहे, ती ही की जी गोष्ट आपणास ‘एकदा..........खरी वाटली ती फिरफिरून दोनदा शिकविणे हा गुन्हा आहे, हे त्यांनी मला शिकविले,.........नवे विचार आणि ताजे वाड्मय ह्यांचा समाजात जसजसा प्रसार होईल, तसतशा आपण मागे बांधलेल्या विचाररचना विसकळून त्यांच्या पायांवर नव्या इमारती उभारल्या पाहिजेत. म्हणजेच शिक्षकांच्या मनावर गंज चढणार नाही व त्यांची गणना केवळ मोडक्या तोडक्या टाकाऊ सामानात होणार नाही.......’ ही मधली स्थिती झाली. हल्लीचे प्रिन्सिपॉल डॉ. ड्रमंड ह्यांनीही गेल्या वर्षाचे आरंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी आम्हांस मोठ्या कळकळीने सांगितले की, बाबांनो आम्ही जो तुमच्यापुढे कसलाही विचार करितो तो केवळ तुमच्या विचारास मदत व्हावी म्हणून होय, त्यावर जबरी करण्यासाठी नव्हे. तुम्हांस नापसंत झालेली आमची मते तर बाजूसच राहोत. पण जर एकादे मत आम्ही निरूत्तर प्रथिपादिले आणि त्याची सर्व प्रमाणे मिळाली असे तुम्हांस वाटले तरी तेवढ्यावरच तुम्ही तृप्त राहू नका. तुमचे व्यक्तिविषयक शोध नेहमी चालू असावेत, आमच्या प्रयत्नाने तुमचे शोध अडू नयेत किंवा आळसावू नयेत.”

ह्या प्रकारे स्वातंत्र्य आणि मोकळेपणा हे कॉलेजचे ब्रीद केवळ शब्दांतच नाही तर करणीतही आहे. कॉलेजचे एकंदर धोरण वा-याप्रमाणे मोकळे, निर्भय व नि:शंक आहे. ही गोष्ट प्रोफेसरांची जी नेमणूक झाली आहे त्यावरून दिसून येत आहे. हक्सले ह्यांनी मागे एकदा म्हटले होते की जर्मनी व हॉलंद ह्या दोन देशांखेरीज सा-या युरोपात कोठेही धर्मशास्त्राच्या अध्यापकास स्वतंत्र विचार व शोध करण्याची सवड नाही. (कारण जुन्या धर्माची जी काही ठराविक मते आहेत त्याबाहेर अध्यापक जाईल तर त्याची वरणी बंद होते.) हक्सलेसाहेबांस मँचेस्टर कॉलेजचा अपवाद आठवला नसावा. किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मोठे नाव व दुर्भेद्य दुराग्रह इकडेच त्यांचे सर्व लक्ष लागले असावे. ह्या कॉलेजातील अधअयापकामागे ही अडाणी दहशत मुळीच नाही. तथापि हे सुधारकी कॉलेज म्हणून ह्यातील सर्व अध्यापक जहाल सुधारक आहेत असेही नाही. तसे असल्यास ह्याची स्वतंत्रता केवळ एकदेशीय झाली असती. आणि अशा बेफाम स्वातंत्र्याचे तुफान-तारू कधीच एकाद्या खडकावर आपटून नामशेष झाले असते. पण वास्तविक प्रकार तसा नाही. हल्ली कॉलेजात पाच कायमचे व दोन हंगामी अध्यापक आहेत. कायमच्या पाचापैकी जुन्या कराराचे अध्यापक रेव्ह. अँडिस हे इतके जुन्या मताचे आहेत, की हे युनिटेरिअन आहेत, की नाहीत ह्याची पुष्कळ वेळां शंका येते. तथापि कॉलेजाकडून त्यास कसलीही उपाधी पोचत नाही. इतकेच नव्हे तर साप्ताहिक उपासनेत पाळीप्रमाणे ह्यांचीही उपासना होते. मात्र तेव्हा तरूण विद्यार्थ्यांत व गावातील काही युनिटेरिअन मंडळीत किंचित कुजबुज होते. (आमच्या प्रार्थना समाजातील व्यासपीठावरून एकाद्याचा नकळत अद्वैताकडे तोल गेल्याबरोबर समाजाची मंडळी लगेच कशी एकमेकांच्या कानांशी जाते ह्याची मला ह्या प्रसंगी आठवण झाल्याशिवाय राहत नाही.)

उलटपक्षी, तुलनात्मक धर्माचे अध्यापक प्रो. कार्पेंटर व तत्त्वज्ञानाचे अध्यापक प्रो. अँपटन् हे अगदी बावनकशी सुधारक आहेत. प्रि. परमपूज्य डॉ. ड्रमंड हे जणू तोल राखण्यासाठीच की काय, मध्येच मेरूप्रमाणे स्थिर आहेत. सुधारक, उद्धारक, नवे-जुने ही विशेषणे त्यास लागू नाहीत. ते आपल्या आध्यात्मिक तेजोबलाने द्वंद्वातीत आहेत. (येथे डॉ. भांडारकरांची आठवण होते.)

असो. ह्याप्रमाणे येथील हवा अगदी मोकळी व शुद्ध आहे. स्वातंत्र्याचा प्रकार पूर्ण व पवित्र आहे. पुष्कळ वेळां असे होते की स्वतंत्र्याची पताका खांद्यावर घेऊन नाचत सुटणारी मंडळी आपल्याच पायाखाली दुस-या मुक्या प्राण्याचे स्वातंत्र्य तुडवीत असतात, ते घाईत बिचा-यास कळतच नाही. तसे येथे होत नाही. स्वातंत्र्यामुळे पुरातन वस्तूसंबंधाने अनादर उत्पन्न होत नाही. तर त्या वस्तूकडे जाण्याची वाट मोकळी होते आणि तिचे साक्षात दर्शन होऊ लागल्यामुळे आदरबुद्धी वाढू लागते. जुन्या नव्याचा कलह मिटतो. असे का तर कॉलेजच्या दारावर ‘स्वातंत्र्य’ एवढीच अक्षरे नाहीत तर त्याबरोबर ‘सत्य’ व ‘धर्म’ हीही आहेत. ‘स्वातंत्र्य’ दारावरच नाही तर आतही आहे हे वर सांगितले. त्याप्रकारे ‘सत्य’ व ‘धर्म’ ह्यांचीही कार्ये घडत आहेत. ती कॉलेजातच नव्हे तर त्याद्वारे सर्व युनिटेरिअन समाजात घडत आहेत. कसे ते हळूहळू पुढे कळेल.

भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना

तारीख १८ ऑक्टोबर १९०६ रोजीं कार्तिकी वर्षप्रतीपदेचा शुभ दिवस आला. दोनच दिवसांपूर्वीं मुंबईतील प्रार्थनासमाजाच्या उदार उपाध्यक्षांनी अशा मंडळीची स्थापना होऊन काम सुरू व्हावें म्हणून एक हजार रुपये दिले होते. पाडव्याच्या शुभ दिवशीं सकाळीं नऊ वाजतां (१८ ऑक्टोबर १९०६) एल्फिन्स्टन रोड स्टेशन लगतच्या मुरारजी वालजीच्या बंगल्यांत मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरितां गांवांतील चार शिष्ट मंडळी जमली. मंडळीचे अध्यक्ष नामदार न्यायमूर्ति चंदावरकर ह्यांनीं जमलेल्या मुलांना पहिला धडा घालून देऊन मंडळीचें काम सुरू करण्यापूर्वी आपल्या भाषणांत खालील अर्थाचें सूत्रवाक्य सांगितलें कीं, ''ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्यानें आम्ही स्वतःलाच वर आणीत आहों. हें पवित्र कार्य करित असतां ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार ? हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणांत न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळें जी अधोगति मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे. असा साधा आणि सात्त्विकभाव आम्हांमध्यें निरंतर जागृत राहो !''  आणि ह्या भावाला अनुसरूनच आज दोन वर्षें मंडळीचें काम चाललें आहे.

हेतु

हिंदुस्थानांतील महार, मांग, चांभार, धेड, पारिया वगैरे (विशेषेंकरून पश्चिम हिंदुस्थानांतील) निकृष्ट वर्गांना व इतर अशाच रीतीनें निराश्रित झालेल्या लोकांना  (१) शिक्षण, (२) कामधंदा, (३) ममतेची आणि समतेची वागणूक, (४) धर्म, नीति, आरोग्य आणि नागरिकता इत्यादीविषयक उदार तत्त्वांचा उपदेश व अशा इतर साधनांच्या द्वारें आत्मोन्नति करण्याचे कामीं साहाय्य करणें, हा ह्या मंडळीचा हेतु असून हिच्या विद्यमानें सध्या खालील संस्था काम करित आहेत.

शाळा

जी. आय. पी. आर. परळ स्टेशनजवळीत नंबर १ ची इंग्रजी-मराठी शाळा आहे. येथें हल्लीं मराठी मूळाक्षरांपासून तो इंग्रजी चार इयत्तांपर्यंत शिक्षणाची उत्तम सोय केली आहे. मुलगे १९० आणि मुली ३० शिकत आहेत. कुर्ल्याजवळ देवनार येथील कचरापट्टींत नंबर २ ची प्राथमिक शाळा आहे. तीमध्यें ४१ मुलें आणि १ शिक्षक आहे. भायखळा येथे नंबर ३ ची प्राथमिक शाळा आहे. तीमध्यें १०१ मुलें आणि ३ शिक्षक आहेत. एकंदर मुलांची संख्या सरासरीनें ५०० असते.

जे. जे. हॉस्पिटलसमोर भंगी लोकांकरितां १ व महालक्ष्मी स्टेशनाजवळील कचरापट्टींत १ अशा दोन दिवसाच्या व एक रात्रीची अशा तीन गुजराथी शाळा चालू आहेत. त्यांत १२५ मुलें आहेत.

पुस्तक बांधण्याचें काम

मुलांना ५ तास सारखें शिकण्याचा कंटाळा येऊं नये म्हणून व काहीं तरी हातकाम यावें म्हणून दररोज दोन तास मोठ्या मुलांना परळच्या शाळेंत पुस्तकें बांधण्याचें व लहानमोठ्या वह्या, ब्लॉटिंग पॅड्स वगैरे तयार करण्याचें काम शिकविण्यांत येतें.

उद्योगशाळा

सन १९१२ एप्रिलपासून प. लो. वासी शेठ एन्. एम्. वाडिया ह्यांच्या इष्टेटींतून दर महा ५०० रु. तीन वर्षेंपर्यंत मिळणार असल्यामुळें मंडळीनें एक उद्योगशाळा उघडली आहे त्यांत सुतारी व शिवण काम शिकविलें जातें.

शिवणकाम

मुलींना व गिरण्यांतून काम करूं न इच्छिणाऱ्या निकृष्ट वर्गांतल्या, पण अब्रदार बायकांना घरीं बसल्या आपले व मुलांचे कपडे शिवतां यावे म्हणून त्यांना साधें शिवणकाम शिकविण्याची व्यवस्था परळच्या शाळेंत केली आहे. सध्यां एक चांभाराची बाई शिकून तयार झाली आहे.

पुस्तकालय

शेठ तुकाराम जावजी, मेसर्स बाबाजी सखाराम आणि कंपनी व मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी वगैरेंच्या साहाय्यानें ३०४ पुस्तकें जमविलीं आहेत. गेल्या वर्षीं ह्यांपैकी २५८ पुस्तकें वाचण्याकरितां देण्यांत आलीं. वाचनालयांत २ दैनिक, ५ साप्ताहिक पत्रें आणि ४ मासिक पुस्तकें ठेवण्यांत येत असतात.

मैदान क्लब

तरुण मुलांनीं वाईट नादाला लागूं नये म्हणून त्यांचा एक क्रिकेट फुटबॉल क्लब आहे. विशेषेंकरून शिमग्यासारख्या सणांत चांदण्यारात्रीं शिक्षक लोकांच्या नजरेखालीं आट्यापाट्या वगैरे खेळ खेळण्यांत येतात. सन १९०७ सालच्या होळीच्या दिवशीं खेळांत हुशार ठरलेल्या गड्यांस, सर भालचंद्र कृष्ण ह्यांच्या हस्तें बक्षिसें वांटण्यांत आलीं व वरील क्लब उघडण्यांत आला. हल्लीं ४० मेंबर व क्रिकेटच्या तीन टोळ्या आहेत. व्यायामाशिवाय ह्या क्लबमार्फत मधूनमधून व्याख्यानें, संमेलनें, वनभोजनें इत्यादि ज्ञानवृद्धि, स्नेहवृद्धि आणि करमणूक करण्याचेंहि प्रकार होत असतात.

देवनार कचरापेटी

येथें सुमारें ५०० म्युनिसिपल कामकरी अंत्यज मानलेल्या लोकांची वसाहत आहे. ही मुंबई म्युनिसिपालिटीच्या मालकीची जागा असून म्युनिसिपालिटीच्या हद्दीबाहेर म्हणजे ठाणें जिल्ह्यांत असल्यानें मंडळीनें पुष्कळ प्रयत्न करूनही ह्या लोकांच्या शिक्षणाची सोय करण्याचा म्युनिसिपालिटीस अधिकारच नाहीं असें शेवटीं ठरलें; आणि मालकी मुंबई म्युनिसिपालिटीची आहे म्हणून ठाणे जिल्ह्यांतूनहि शिक्षणाची व्यवस्था अद्यापि झाली नाहीं ! मिळून आज कित्येक वर्षें इतक्या लोकांची उणीव भरून निघाली नाहीं. शेवटीं तेथें वरील शाळा आपल्याच खर्चानें उघडून मंडळीनें गरज भागविली. हल्लीं शेठ हाजी युसफ हाजी इस्मायल ह्यांच्या उदार मदतीनें एक झोंपडी बांधून तिच्यांत एक दिवसा आणि एक रात्रीं अशा शाळा चालू आहेत. शिवाय मंडळीकडून मधून मधून व्याख्यानें, कीर्तनें, बक्षीस-समारंभ वगैरे होत असतात.

वाङ्मय

अस्पृश्य मानिलेल्या लोकांची कठीण स्थिति वरिष्ठ लोकांच्या नजरेस यावी व त्यांची सहानुभूती मिळावी, म्हणून इंग्रजींत तीन लहान पुस्तकें छापून त्यांच्या पुष्कळ प्रति फुकट वांटण्यांत येत आहेत. शिवाय प्रमुख इंग्रजी, मराठी आणि गुजराथी पत्रांतून वेळोवेळी ह्या लोकांच्या स्थितीसंबंधीं व कामासंबंधी लेख येत असतात.

निराश्रित सेवासदन
केवळ शाळा आणि दवाखाने स्थापिल्यानें आणि मधूनमधून व्याख्यानें दिल्यानें ह्या लोकांची गृहस्थिति आणि सामाजिक स्थिति सुधारावयाची हा मंडळीचा जो मुख्य हेतु तो अंशतःहि पूर्ण व्हावयाचा नाहीं. ह्या कामी काही स्वार्थत्यागी आणि श्रद्धाळू माणसांनी आपल्याला वाहूनच घेतलें पाहिजे; त्यांनी ह्या लोकांच्या वसतींत राहून, त्यांच्या घरीं वरचेवर जाऊन त्यांच्या बायांबापड्यांना कामकाज, करमणूक, भजन, प्रार्थना इत्यादिकांच्या निमित्तानें आपल्या घरीं बोलावून व एकंदरीत अशा रीतीनें त्यांच्यांशीं मिळून मिसळून राहिले पाहिजे व मंडळीच्या ज्या निरनिराळ्या संस्था चालू आहेत त्यांकडे त्या लोकांचें लक्ष वेधलें पाहिजे; अशा प्रकारच्या एका आश्रमाची अत्यंत उणीव भासूं लागली. मंडळीच्या चालकांच्या मनांत हे विचार येण्याच्या संधीस ईश्वरकृपेनें त्यांची व एका उदार अंतःकरणाच्या सत्पुरुषाची अवचित गांठ पडून असा आश्रम निघत असेल तर आपण त्याच्या खर्चांसाठी दरमहा शंभर रुपयांची नेमणूक करून देऊ, असे वचन देऊन फेब्रुवारी १९०७ महिन्यापासून त्यांनी ही नेमणूक चालू केली ! व ता. २१ मे रोजीं 'निराश्रित सेवासदन' ह्या नांवानें हा आश्रम सुरू झाला.

हल्लीं प्रार्थनासमाजांतील दोन पुरुष व दोन स्त्रिया यांनीं मंडळीचें काम अंगमेहनतीनें करण्याचें पत्करिलें आहे.

मंगळूर

दक्षिण कानडा जिल्ह्यांत पारिया लोकांची स्थिति फारच दुःसह आहे. मंगळूर ब्राह्म समाजाचे सेक्रेटरी श्रीयुत के. रंगराव हे एकटेच ह्या गरीब लोकांसाठीं गेलीं दहा वर्षें खपत आहेत. सरकारापासून एक प्रशस्त जागा घेऊन त्यांनीं आतां येथें एक ऐसपैस पक्की इमारत बांधली आहे. त्यांची अलीकडे बंद पडलेली शाळा फिरून तारीख ३ नोव्हेंबर १९०७ रोजी ह्या इमारतींत उघडण्यांत आली. हल्ली येथे पारियांची ५१ मुलें शिकत आहेत. पैकी ४ मुलांना दोन्ही वेळ जेवण घालून शाळेंतच ठेवण्यांत येतें आणि २६ मुलांना दोन प्रहरी एक वेळ जेवण घालून रात्री घरी पाठविण्यांत येते. अशा व्यवस्थेशिवाय शाळा चालणेंच शक्य नाहीं. येथील ब्राह्मसमाजांतील सुमारें बारा तरुणांनीं एकत्र जमून एक 'तांदूळ फंड' स्थापन केला आहे. दर रविवारी उपासनेनंतर ते घरोघर जाऊन एक एक मुष्ठीभर तांदूळ जमवितात. तारीख २७ नोव्हेंबर १९०७ रोजी उद्योगशाळा उघडण्यांत आली. हल्लीं सहा भाग तींत चालू आहेत. त्यांवर मुलांना विणकाम शिकविण्यांत येते. ह्या शाळेकरितां सध्यां दोन हजार रुपयांची फार जरूरी आहे. त्यासाठीं पन्नास रुपयांचा एक असे चाळीस भाग काढले आहेत, उदार गृहस्थांनीं या कामीं मदत करणें हें त्यांचें कर्तव्य आहे.

मंडळीच्या शाखा व संस्था

१.  मुंबई - ४ दिवसाच्या शाळा, विद्यार्थी ५००.  १ वसतिगृह, विद्यार्थी २६. २ भजन समाज.  १ उद्योगशाळा (सुतारी, शिवणकाम व बांधकामाचें शिक्षण ).
२.  पुणें - १ दिवसाची शाळा, विद्यार्थी २००.  १ भजनसमाज.  सुतारीचे व शिवणाचे वर्ग.  १ लायब्ररी इ.
३.  सातारा - १ रात्रीची शाळा.  १ भजनसमाज.
४.  महाबळेश्वर - १ उद्योगशाळा (दोरखंड व नवार करणें)
५.  दापोली, ६ ठाणे व ७ मालवण - येथें गरीब विद्यार्थ्यांस मदत करणाऱ्या कमिट्या.
८.  मंगळूर - १ दिवसाची व १ रात्रीची शाळा.  १ विणण्याचा कारखाना.  १ वसतिगृह.  १ वसाहत.
९.  मद्रास - २ दिवसाच्या व २ रात्रीच्या शाळा, विद्यार्थी १३०.
१०. हुबळी - १ दिवसाची, १ रात्रीची शाळा. १ वसतिगृह.
११. अकोला - ३ रात्रीच्या शाळा.  १ वसतिगृह.
१२.  अमरावती - २ रात्रीच्या शाळा.
१३.  भावनगर - १ दिवसाची शाळा.  १ दवाखाना.
१४.  इंदूर - १ रात्रीची शाळा.

एकूण १४ शाखांच्या २४ शाळा व ५ वसतिगृहें आहेत. १२ इतर संस्था. त्यांत ५५ शिक्षक व ११०० विद्यार्थी आहेत. दरसाल मंडळीचा खर्च वीस हजार (२०,०००) रुपयांवर आहे.

येणेंप्रमाणें आपल्या प्रांती ह्या हतभागी वर्गांच्या उन्नतीसंबंधाच्या प्रयत्नांची थोडक्यांत हकीगत आहे. ह्या वर्गाच्या अफाट संख्येच्या मानानें हे प्रयत्न सिंधूत बिंदूप्रमाणें फारच अल्प आहेत हें जरी खरें आहे, तथापि ज्या महात्म्यांच्या उदार अंतःकरणांत शुभ प्रेरणा होऊन ह्या अल्प प्रयत्नास सुरुवात झालेली आहे त्यांच्या मंगल कामनेप्रमाणें त्यांनीं आरंभिलेल्या प्रयत्नांस कांहीं कालानें विशाल स्वरूप प्राप्त होईल, अशी आम्ही आशा बाळगितों.

हल्ली मंडळीच्या कामाकरितां मुंबई आणि पुणें मुक्कामीं इमारतींची फार नड भासत आहे. निदान पश्चिम हिंदुस्थानांतील निकृष्ट वर्गांच्या हिताकरितां मंडळीच्या मनांत जें कांहीं करावयाचें आहे, त्याच्या खर्चासाठीं पैशाची फारच मोठी गरज आहे.

'ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्यानें आम्ही स्वतःलाच वर आणित आहों...' ह्या, ह्या संस्थेच्या संस्थापनेच्या वेळीं संस्थेचे अध्यक्ष न्यायमूर्ति सर चंदावरकर यांनीं सांगितलेल्या मंत्रवाक्याचा सतत जप करून प्रत्येक महाराष्ट्रीय धनी, निर्धन, स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, ब्राह्मण, शूद्र शक्त्यनुसार ह्या हीनदीन लोकांच्या हितासाठीं तनमनधनानें प्रयत्न करील अशी आम्ही उमेद बाळगितों.

तो सत्य संकल्पाचा दाता भगवान् आमची ही मंगल कामना पूर्ण करो  !

ब्रिटिश म्युझिअम

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. ७-२-१९०२

‘कालो ह्ययं निरवधिविपुला च पृथ्वी’
ह्या विपुल पृथ्वीवर निरवधी कालातून ज्या अनेक सुधारणांचा आजवर अवतार झाला आणि समाप्ती झाली, त्या सर्वावर शिरोमणी होऊन बसलेली जी आधुनिक सुधारणा तिच्या साम्राज्याखाली आम्ही आहो. जगाच्या इतिहासात ज्यांनी हजारो वर्षे आपले प्रताप गाजविले, अशा गत सुधारणांपैकी काहींचे हल्ली फार थोडे अवशेष राहिले आहेत. काही नुसत्या नामशेष झाल्या आहेत, आणि काहींचा तर विस्मृतीच्या  अभेद्य अंधार-पटलातून अद्यापि पत्ता लागला नाही. मागील सुधारणा जगाच्या रंगभूमीवरील एकेका कोप-यात आपापले प्रकाश पाडून अस्तास गेल्या, पण हल्लीचा सुधारणा-सहस्त्ररश्मी सर्व भूगोलावर आपला प्रकाश पाडून वरती तारामंडलात चंद्र, मंगळ इत्यादी खगोलांकडे आपली किरणे सोडीत आहे. तथापि आमचे डोळे दिपून जाऊ नयेत. स्वकालीन सुधारणेविषयी पक्षपात घडून अंगी स्वयंमन्यता शिरू न दिली पाहिजे. कालचक्राच्या वाढत्या कलेकडे नजर दिली असता, शास्त्र, कला, वाड्मय इ. बाबतीत मागच्यात न सापडणारा असा एकादा जाज्वल्य विशेष गुण आधुनिकेत आहे, असे जरी म्हणता येत नाही, तरी एक भेद फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. मागील सुधारणांचा प्रदेश आकुंचित होता, इतकेच नव्हे, तर त्यास परस्परांची खबरच नव्हती. ऐतिहासिक-प्रवृत्ती आणि तुलनात्मक शास्त्रीय पद्धती हे दोन गुण हल्लीप्रमाणे व हल्लीच्या प्रमाणाने मागे नव्हते, असे म्हटल्यास आत्मस्तुतीच्या विशेष दोष घडेल असे वाटत नाही. ह्या प्रभेदाचे मूर्तिमंत स्वरूप पहावयाचे झाल्यास वर निर्दीष्ट केलेले ब्रिटिश म्युझिअम हे अत्यंत उत्तम स्थान आहे. तर ते आपण पाहू या.

लंडन शहराचे मध्यभागी ब्लूमसबरीमध्ये ब्रिटिश म्युझिअमची विशाल इमारत आहे. इमारत अत्यंत सुंदर व त्याहूनही अफाट आहे खरी, पण तिच्याकड पहाण्यास व तिचे मोजमाप घेण्यास आपणास सध्या वेळ नाही, तर आपण थेट मध्य दालनात जाऊ या. अगणित पैसा अगदी पाण्याप्रमाणे ओतून ह्या लोकांनी जे हे विचित्र आणि विविध विषयांचे अदृष्टपूर्व संग्रहालय करून ठेविले आहे, ह्याचा हेतू केवळ चार रिकामटेकड्यांनी येथे सहज वाट चुकून येऊन आपल्या आळसावलेल्या मनाची चार घटका करमणूक करून घ्यावी एवढाच असेल अशी कल्पनादेखील मनात आणू नका. उलट ते पहा, मोठे मोठे प्राचीन इतिहासशास्त्री, शोधक, लेखक, पंडित एकेका कोप-यातून एकाद्या पदार्थाकडे किती खोल दृष्टीने टक लावून पहात आहेत! तर आपण त्यास कसलाही त्रास पोहोचू नये म्हणून पाऊल न वाजविता हळूच आत शिरू या. चित्त वेधून जाऊन अंत:करण तल्लीन होणे ही खरोखर ज्ञानप्राप्तीच्या वेळेची स्वाभाविक अवस्था होय. अगदी लहान मुले अशीच बिनश्रमाने पण मोठ्या कौतुकाने मानवी ज्ञानाचा मोठ्या महत्त्वाचा भाग केवळ पूर्ववयातच शिकतात. तशातलाच काहीसा (प्रकृतीच्या मानाने अर्थात कमी-जास्ती) प्रकार आपलाही येथे होईल, करमणूक तर होईलच होईल. पण नकळत ज्ञानप्राप्ती काय झाली, ते आपल्यास बाहेर पडल्यावर कळेल.

आता आपण मध्य दालनात उभे आहो. सभोवती प्रागैतिहासिक कालाचा देखावा पसरला आहे. ह्या कालाचे मुख्यत: चार भाग होतात.

१ ला.  (Palaeolithic Age) “पूर्वपाषाणयुग”- ह्या पहा आमच्या पूर्वजांच्या सापडलेल्या काही अत्यंत जुन्या वस्तू. आमचे बंधू जे इतर प्राणी त्यांच्यापासून आमचे पूर्वज येथे नुकतेच विभक्त झाले आहेत. संसारयात्रेत अगर जीवनकलहात त्यांनी आपल्या शरीराबाहेरची प्रथम जी उपकरणे उपयोगात आणिली ती हत्यारे ही होत. अर्थात ती दगडाचीच असावयाची. ही नदीच्या प्रवाहातून व गुहांतून सापडली आहेत. कारण आम्ही त्यावेळी गुहांतूनच राहत होतो. ही हत्यारे किती वेडीवाकडी ओबडधोबड आहेत! त्यातच पहा काही लहान मोठी हाडे मिसळून ठेविली आहेत. ती हल्ली लुप्तप्राय झालेल्या त्यावेळच्या पाणघोड्यांची व सांबरांची असावीत. हे लोक इंग्लंडात व वेल्समध्ये कोणकोणत्या प्रदेशात रहात होते, हे दाखविण्यासाठी तो पहा भिंतीवर त्यावेळचा इंग्लंडचा नकाशा टांगला आहे. आम्ही त्यावेळी भांडी वापरीत होतो की नाही, ते सांगता येत नाही. तसेच आमच्या हत्यारांस मुठीही नाहीत. थोडेसे पुढे चला, तुम्हांला मुठी दिसतील. शेवटी येथे पहा किती सुंदर हस्तीदंती व शिंगटांच्या मुठीत ही कट्यारे बसविली आहेत. ह्या मुठीवरून त्या त्या प्राण्यांची किती हुबेहूब चित्रे उठविली आहेत. ही ह्या युगातली नव्हेत बरे! ही पहा ह्या मोठ्या तावदानाच्या पेटीत आमच्या राहत्या गुहेची तळजमीन, जशीच्या तशीच आणून ठेविली आहे. ही फ्रान्सात सापडली.

२ रा. (Neolithic Age) “उत्तर-पाषाणयुग”-येथील हत्यारे चांगली घासलेली पुसलेली पाणीदार आहेत. ज्या प्राण्यांची हाडे येथे दिसतात, त्यांपैकी काही अद्यापि सापडतात. येथे पहा काही हत्यारे करण्याचे कारखाने सापडले आहेत. कारण येथे अर्धवट बनविलेली पुष्कळ हत्यारे व हत्यारे बनविण्याची काही यंत्रे व सामान सापडले आहे. तशीच येथे थडग्यांत सापडलेली काही भांडी आहेत. बहुतकरून आत मृतांची राख असावी.

३ रा. (Bronze Age) “काशाचे युग”- इतक्या प्राचीन काळी लोखंडाच्याही पूर्वी ही मिश्र धातू कशी आढळते, हा एक चमत्कारच आहे. येथे भांड्यांत व हत्यारांत पुष्कळ सुधारणा झाली आहे. त्यांचे कट्यारे, कोयते, सु-या, बर्च्या, तरवारी इ. अनेक प्रकार आढळतात. तसेच हे पहा सोन्याचे दागिने. पण रूपे मात्र अद्यापि नाही सापडले. ती पहा भिंतीवर टांगलेली काशाची सुरेख ढाल. तशाच येते काशाची हत्यारे बनविण्याच्या कितीतरी मुशी जमा करून ठेविल्या आहेत! इकडे पहा स्विट्झरलंड व सव्हाय ह्या देशांतील सरोवरांच्या मध्यभागी पाण्यात डांब रोवून त्यावेळी बांधलेल्या घरांचे काही अवशेष ठेविले आहेत. ही चटकन् पाहिजे तेव्हा मासे धरता यावेत म्हणून केलेली योजना बरे! ह्यावरून युरोपातील पूर्वीच्या लोकांची रहाटी कशी होती ते कळते. ह्या घरांचे अवशेष आतापर्यंत जसेच्या तसेच कसे राहिले, ह्याबद्दलचा चमत्कार ध्यानात ठेवण्यासारखा आहे, तो हा-ही घरे आगीने जळून ह्यातील धातूचे व दगडाचे सामान पाण्यात बुडून व चिखलात रूतून शोधकांस सुरक्षित सापडले आहे. प्रथम आगीची क्रिया घडून वर चिखलाचे दाट दडपण पडल्यावर मग त्यास वज्रलेपच झाला म्हणावयाचा!

४ था. (Early Iron Age) “लोखंडी युग”—ह्यात  आपल्यास माहीत असलेले बरेच पदार्थ आहेत. शिवाय आपण इतिहासाच्या अगदी जवळ येऊन भिडलो तर दुसरीकडे जाऊ या. हे पहा आंदमान आणि निकोबार बेटांतील रानटी माणसांचे हाडाचे दागिने व हार. ही हाडे यांच्या आप्तांची आहेत. ही वापरल्याने कित्येक आजार बरे होतात, अशी ह्यांची कल्पना आहे. येते भयंकर मुखवटे ठेविले आहेत. रोग्यास बरे करण्याकरिता सिलोनातील पंचाक्षरी हे मुखवटे आपल्या डोक्यावर घालून नाचत असत. रामबाण उपाय! दुस-या बाजूस ऑस्ट्रेलिया व आसपासच्या बेटांतील काही विक्षिप्त मुखवटे ठेविले आहेत. हे घातले असता त्यावेळी पारधीत हटकून यश येत असे! इकडे हे वैझान बेटातील देवाच्या मूर्ती, झगे व अक्राळ विक्राळ पिसांचे मुकुट ठेविले आहेत, ते पहावतदेखील नाहीत! तसेच मिशनरींनी दक्षिण पॅसिफिक महासागरातील दूरदूरच्या बेटांतून आणिलेल्या अनेक मूर्तींचा व चमत्कारिक पदार्थांचा बहुमोल संग्रह करून ठेविला आहे. आता अमेरिकन दालनात चला, उत्तर अमेरिकेत वर अगदी थेट सरोवरापर्यंत अगदी प्राचीन काळीदेखील भांडी होती असे दिसते. दगडांची हत्यारे व भांडी यांचे प्राचीन युरोपच्या मासल्याशी किती साम्य आहे पहा! येथील प्राचीनांना तांब्याशिवाय दुसरी धातू माहीत नव्हती. त्याची घडीव भांडी थडग्यांतून व जुन्या इमारतीच्या पायाखाली सापडली आहेत. ही पहा शिंपांची नाणी, गारेच्या बर्च्या, बाणांची टोके-आणि विसरू नका-तंबाकूच्या चिलमी तावदानात सुरेख मांडून ठेविल्या आहेत. पण ह्या नव्या जगाचा जुन्या जगाशी पूर्वी कधीकाळी कसला तरी संबंध होता की नाही हे कोडे अद्यापि उकलले नाही.

इतका वेळ पाहिलेल्या गोष्टींवरून प्रागैतिहासिक सुधारणांची थोडी तरी कल्पना तुमचे मनात आली असेल. आता आपण ऐतिहासिक कालाकडे वळू या. ह्या ठिकाणी मिसर, आसिरिया, बाबिलोनिया, ग्रीक, रोमन इत्यादी गतराष्ट्रांच्या सुधारणांचे अवशेष राखून ठेविले आहेत. ही ह्या सुधारणांची जणू प्रेतेच आहेत! काहींचे बरेच भाग शाबूत आहेत. काही काळरूपी गिधाडाने अगदी छिन्नविच्छन्न करून टाकिली आहेत. ही पहा इजिप्शिअन ग्यालरी. आपण वेदांस अती प्राचीन मानितो, किंबहुना जगाच्या सुधारणेस येथूनच आरंभ झाला असे म्हणतो. इतकेच नव्हे तर वेद अनादि आहेत असे मानण्यापर्यंतही आमची मजल जाते. पण ह्या बाबतीत ज्यांनी परिश्रम केले आहेत ते वेदांस ख्रिस्ती शकापूर्वी १५०० वर्षांपेक्षा अधिक मागे नेत नाहीत. त्यांचे म्हणणे खरे असेल तर आम्हांपासून वेदांचा उदय जितका दूर आहे, तितकाच जवळजवळ इजिप्शिअन सुधारणेचा उदय वेदापासून मागे दूर आहे असे म्हणावे लागते. कारण ख्रिस्तीशकापूर्वी ४५०० वर्षांच्याही मागचे इजिप्शिअन लेख आणि राखून ठेविलेली प्रेते आढळतात. इजिप्तच्या प्राचीन इतिहासात जे राज झाले त्यांची एकंदर तीस घराणी आहेत. ह्यांनी इ. स. पूर्वी ४४००-३४० पर्यंत राज्य केल्याचे लेख आढळतात. प्राचीन शाही (इ. स. पूर्वी ४४००-२४६५), मधली शाही (इ. स. पूर्वी २४६५-१२००), नवी शाही (इ. स. पूर्वी १२००-३४०) असे ह्याचे भाग पडतात. पहिल्या तीन घराण्यांतील राज्यांची नुसत्या नावापलीकडे काही माहिती मिळत नाही. चौथ्या घराण्याने आपल्या वैभवाची कायमची स्मारके करून ठेविली आहेत. दुसरा राजा खुफू (इ.स. पूर्वी ३७३३-३७००) याने गीझे येथील (Great Pyramid) मोठा मनोरा बांधिला. त्याचे काही दगड उत्तरेकडील खोलीत ठेविले आहेत. पहिल्या खोलीत कालानुक्रमाने ममी व ममीच्या पेट्या मांडून ठेविल्या आहेत. ममी म्हणजे इजिप्शिअन लोकांनी पुरातन काळी अनेक प्रकारचे मसाले तयार करून त्यात सुरक्षित स्थळी राखून ठेविलेली प्रेते होत. ह्या लोकांमध्ये ही चाल इ. स. पूर्वी ४५०० (कदाचित ह्यापेक्षाही पूर्वी) वर्षापासून इ. स. नंतर ५०० वर्षांपर्यंत होती. निजलेल्या मनुष्याचा आत्मा जसा पुन: परत येतो तसा मृत शरीरातही आत्मा परत येणार आहे अशी ह्य लोकांची समजूत होती. म्हणून इतके श्रम करून व अक्कल खर्चुन ते आपल्या नातलगांची प्रेते जपून ठेवणे हे आपले कर्तव्य मानीत ममी करण्याच्या निरनिराळ्या त-हा होत्या. प्रेताची आतडी बाहेर काढून एका घटामध्ये घालून त्याच्या शेजारी ठेवीत, आणि प्रेतास प्रथम अनेक प्रकारच्या क्षारांचे आणि अत्तरांचे लेप देऊन वर सुरेख तागाच्या पट्ट्यांनी त्यास लपेटीत. कधी-कधी ४०० यार्ड लांब पट्ट्या लागत असत! गुंडाळताना प्रेतास सपशेल उताणे निजवीत. ममी तयार झाल्यावर त्यास त्याच्याच आकाराच्या लाकडी अगर दगडी पेटीत घालून ती बंद करीत, वरती रंग देऊन प्रेताचे चित्र काढीत, व लेख खोदीत. ब-याच पेट्यांवरचा रंग व चित्रे अद्यापि जशीया तशीच आहेत. पिवळा रंग हा ह्यांचा मोठा आवडीचा दिसतो.

इजिप्शिअन लोकांची अत्यंत पुरातन थडगी म्हणजे मास्टाबा अथवा पिरामिड (मनोरे) हे होत. खाली प्रथम देवळाच्या आकाराची एक खोली करून तिच्या एका भागात मयताची मूर्ती बसवीत. तिच्याच खाली जमिनीत तळघर करून त्यात त्याची ममी ठेवीत. कित्येक ठिकाणी खडकातून अशी पुष्कळ घरे खोदून त्यात एका कुटुंबातील अगर घराण्यातील सर्व ममींची योजना केली जात असे. ह्या घरांच्या भिंतीवरून मयताच्या करमणीसाठी त्याच्या चरित्रातील घरगुती आणि सामाजिक प्रसंगांची सुंदर चित्रे काढीत. उत्तरेकडील दालनात ह्या भिंतीवरचे पदर चित्रासकट जसेच्या तसेच काढून लाविले आहेत ते पहा, म्हणजे ५-६ हजार वर्षापूर्वीची इजिप्शिअन राहाटी तुम्हांला कळेल. त्याच भिंतीवर ‘एबिडॉस’ची फळी लाविली आहे. तिच्यावर इ. स. पूर्वी ४४००-१३३३ पर्यंतच्या सर्व राजांची नावे कोरली आहेत. हा एक फार महत्त्वाचा ऐतिहासिक देखावा आहे. तसेच मयतासाठी त्याच्याजवळ मद्य, खाद्य व अंगाला लावण्यास उटी वगैरे जरूरीचे पदार्थ निरनिराळ्या पात्रांत भरून ठेविलेले असत. नंबर ४ च्या खोलीत कित्येक सुंदर खुजे, पेले, वाडगे ठेविले आहेत. कित्येकांवर त्यांच्या मालकांची अगर तत्कालीन राजांची नावे आहेत. ह्यांपैकी जेव्हा काही पात्र सापडली तेव्हा अद्यापि त्यांतील पदार्थ द्रवस्थितीत सापडला! ह्याशिवाय मयतांच्या आवडीची वाद्ये व इतर जिनसा आणि त्याच्या नातलगांच्या व मित्रांच्या देणग्याही सर्व ते आपल्या जवळच ठेवती. मेन-काऊ-रा नावाच्या न्यायी आणि द्याळू राजाच्या ममीवर पुढील शब्द लिहिले आहेत-‘ऑसिरिस, उत्तर दक्षिणाधिपति चिरंजीव स्वगोत्पन्न “दैवी चमत्कार”’ ह्या रूपाने तुझी आई नट ही तुजवर पसरली आहे. हे मेन-काऊ-रा, तू अजातशत्रू देव होशील असा तिने आशीर्वाद दिला हे. ह्या खोलीच्या शेवटी अखेरच्या न्यायप्रसंगाचे चित्र दाखविले आहे ते पहाण्यासारखे आहे. वर सर्व देव आपापल्या दर्जाप्रमाणे न्यायासनावर बसले आहेत. त्यांच्यापुडे मयत जो अनी त्याच्या अंत:करणाचे (Conscience) वजन करण्याचे काम चालले आहे. एका पारड्यात एक लहानसे पीस ठेविले आहे. व दुस-यात अनीचे अंत:करण आहे. हलक्या पिसाशी तुलना होणार मग अर्थात न्याय कसोशीने होईल यात शंका नाही. अँन्युबीस तराजू पारखीत आहे. समोर विधी उभा आहे, मागे नशीब व जन्मदेवता अगर सटवाई उभी आहेत, डावीकडे स्वत:अनी नम्रपणे उभा आहे, उजवीकडे थॉत् निकाल नमूद करीत आहे. पाठीमागे अमिमाईड राक्षस गिळण्यास टपला आहे. त्याचे डोके सुसरीचे, मध्यभाग सिंहाचा आणि मागील बाजू गेंड्याची आहे. हा देखावा पाहून जो पाप करील तो मात्र खरा निगरगट्ट म्हणावयाचा!

तिस-या खोलीत काही जनावरांच्या ममी करून ठेविल्या आहेत, बैल, सुसर, कुत्री, माकडे इ. प्राणी देवादिकांना फार प्रिय झाल्यामुळे, कालंतराने ते स्वत:च पूज्य होऊन बसले, अर्थात त्यांच्याही ममी करणे भाग पडले. कानडी मुलखात जसे ‘बसवण्णाचे’ फार माहात्म्य आहे तसे इजिप्तची पहिली राजधानी मेफिस् येते ऍफिस् वैलाची मोठ्या थाटाची पूजा होत असे. ज्यू लोकांच्या सैन्याच्या वासराची उत्पत्ती या ऍफिसपासूनच झाली असावी.

असो, ह्याप्रमाणेच असिरियन, बाविलोनियन, ग्रीक, रोमन, फिनिअन व एद्रुस्कन वगैरे राष्ट्रांचे गतवैभव येते साक्षात दिसत आहे. तसेच निरनिराळ्या दालनांतून हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती, महमदी व यहुदी धर्मांचे प्रदर्शन केले हे. आमच्या तेहतीस कोटी देवता, पुराणांतील कथाप्रसंग, पूजेचे संभार, तुलसीवृदांवने आदिकरून हिंदू धर्माची सौम्य, मधूर, उग्र, अशी सर्व स्वरूपे येते एके ठिकाणीच दिसतात. ह्या प्रकारे आपण प्रागैतिहासिक कालातून प्राचीन कालात व प्राचीनातून अर्वाचीनात हिंडता हिंडता शेवटी खालच्या अवाढव्य पुस्तकालयात उतरतो. हा जगातील एक अत्यंत मोठा ग्रंथसंग्रह. येथे केवळ छापील पुस्तकांची संख्या वीस लक्षांवर आहे. हस्तलिखित पुस्तकात हिंदू, अरबी, फारशी, चिनी, जपानी, इ. ५०,००० प्रतींचा संग्रह आहे. चिनात छापण्याची कला कशी उद्भवली व नंतर तेथे आणि दुसरीकडे तिचा हळूहळू कसा विस्तार झाला, हे दाखविण्यासाठी त्या त्या काळाची छापील बुके अनुक्रमे लावून ठेविली आहेत. पंधराव्या शतकापासून तो अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत पुस्तक बांधण्याच्या कलेचा कसा विकास झाला, हे दाखविण्याकरिता शेवटच्या सहा कपाटांत निवडक बांधणीची मोठमोठी पुस्तके जुळवून ठेविली आहेत. मध्यभागी सहा कपटांत इ. स. पूर्वी ३०० वर्षांपासून तो इ. स. नंतर १५०० वर्षांपर्यंत लेखनकलेचा इतिहास दाखविण्याकरिता त्या त्या काळच्या हस्तलिखित प्रती अनुक्रमे मांडून ठेविल्या आहेत. प्राचीन काळी इजिप्त देशात पेपिरस नावाच्या बोरूच्या झाडाच्या सालीचा एक प्रकारचा कागद बनवीत असत. इजिप्तचे प्राचीन लेख ह्याच कागदावर लिहिले आहेत. सर्वात जुना उपलब्ध लेख इ. स. पूर्वी ३५०० वर्षांचा आहे!...... ह्याशिवाय वर्तमानपत्रे आणि मासिके ह्यांची एक निराळी खोली आहे. नवीन होणा-या पुस्तकांचा  ह्या संग्रहात समावेश व्हावा म्हणून संयुक्त राज्यातील प्रत्येक प्रकाशकाने आपल्या नवीन पुस्तकाची एकेक प्रथ एडिंबरोची लायब्ररी, आणि ब्रिटिश म्युझिअम येथे पाठवावी, असा पार्लमेंटाने सक्तीचा कायदा केला आहे. ह्याप्रकारे म्युझिअम पाहून दारात आल्यावर तोंडातून आपोआप उद्गार येतो की “कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी”.

ब्राह्मसमाज व आर्यसमाज

(ह्यांतील हल्लींचे साम्यभेद व पुढें ऐक्यार्थ यत्न.)
मुंबई येथें फ्री रीडिंगरूम, बोरीबंदर येथें झालेलें व्याख्यान. सु. प. ता. २२-११-१९०३.

सन १८३० सालीं राजा राममोहनरायांनी बंगाल्यात ब्राह्मसमाज काढिला. स्वामी द्यानंदजींनी येथे १८७५ चे सुमारास आर्यसमाज स्थापला. ह्या दोन महापुरूषांच्या सामर्थ्याने व त्यांच्या अनुयायांच्या उद्योगामुळे हिंदुस्थानात शुद्ध, स्वतंत्र आणि उदार धर्माच्या प्रसारार्थ गेल्या शतकात प्रचंड यत्न झाला व तो अद्यापि वाढतच आहे. मुंबई इलाख्यातल्या काही ब्राह्ममताच्या समाजास जरी प्रार्थनासमाज हे नाव आहे, व क्वचित उपासनासमाज असेही नाव आढळते, तथापि वस्तुत: सर्व ब्राह्मांची स्वीकृत मते व इष्ट हेतू एकच असल्याने संज्ञेच्या सोयीसाठी सर्वांस ब्राह्मसमाज ह्या एकाच साधारण नावाने ओळखल्यास काही बाधा नाही. तसेच, पंजाबात जरी काही अंतस्थ कारणामुळे आर्यसमाजातही दुही आणि तट पडले आहेत, तरी सर्व ‘आर्यांचा बहाणा एकच असल्याने आर्यसमाज हे साधारण नाव त्यांनाही सारखेच लागू पडते.’

आता ह्या दोन मोठ्या सुधारकचमूंत प्रधान गोष्टींत साम्य

काय आहे ते थोडक्यात पाहू. ईश्वर आहे इतकेच नव्हे तर, ईश्वर म्हणजे केवळ एक अंध आणि अहेतुक शक्ती नसून, ती जिवंत, जागृत, सर्वत्र व्यापारमय वस्तू आहे. विश्वविकासात त्याचा मंगल हेतू आहे, व अवीट प्रमाणावर त्यांच्या योजनेला यशच येत चालले आहे. थोडक्यात सांगावयाचे तर तो पुरूष आहे- पुरूषोत्तम म्हणण्याचे कारण, आमच्यासारख्या अपूर्ण पुरूषांहून त्याची भिन्नता दाखविण्यासाठी. अर्थात तो एकच अद्वितीय आहे. केवळ चिन्मय असल्याने त्यास अवयवाची जरूरी नाही.

आत्मा - आम्हा जीवांमध्ये अहकारमूलक जो आत्मा आहे तोही वस्तू आहे, केवळ भास नव्हे. ईश्वराचे ठायीच त्याची वसती आणि वाढ आहे. त्याला नाश नसून तो सदैव प्रगमनशील आहे.

उपासना - आम्ही जी ईश्वराची उपासना करावयाची ती बाह्मोपचारिक नसावी, किंवा तिच्यात विधिसंस्काराचे वृथा अवडंबर नसावे. म्हणजे एकपक्षी मुळी ईश्वरच निरवयव, निराकार असल्याने त्याची कोणत्याही सृष्ट पदार्थाने मूर्ती घडविता येत नाही व दुस-या पक्षी त्याचे सूक्ष्म स्वरूप व त्याचा आपल्याशी सर्व बाजूने असलेला निकट संबंध ह्यांचे ग्रहण आपल्या मनानेच करून घेण्याचा कमीअधिक मानाने सर्वच माणसांचा अधिकार आहे, म्हणून त्याच्या उपासनेस कसल्याही जड साधनांची गरज नाही.

ह्याप्रमाणे एक ईश्वर, सतत विकास पावणारा आत्मा, आध्यात्मिक उपासना, इत्यादी धर्माच्या पारमार्थिक तत्त्वसंबंधी ब्राह्म आणि आर्य ह्या दोघांचे साम्यच नव्हे, तर ऐक्य आहे. इतकेच नव्हे तर धर्म म्हणजे वरील शुद्ध विचार इतके ठरवून स्वस्थ न बसता त्यांच्या पायावरच आपले ऐहिक आचार करण्याचा दोघांचाही आग्रहपूर्वक यत्न आहे. म्हणून सामाजिक बाबतीत सर्व माणसांचे बंधुत्वाचे नात आहे, त्यांचे हक्क सारखे आहेत, गुण-कर्मादी आगंतुक गोष्टीशिवाय वस्तुत: त्यांच्यांत भेद नाहीत, रूढीमुळे जे पाळण्यात येतात ते पाळू नयेत, केवळ जड हेतूने सामाजिक सुधारक ज्या काही सुधारणा आज घडवू पाहतात, त्या सर्व धर्माच्या उच्च पायावरून घडून याव्यात, अशी दोघांचीही सारखी खटपट आहे.

राजकीय बाबतीतही, राजा म्हणजे केवळ देव नव्हे, तो माणसांचाच प्रतिनिधी आहे. माणसांमध्ये जी धर्मबुद्धी आहे तिच्याच आश्रयाने सर्व राजकारण आटपावे, असे दोघांसही वाटते.

ह्याप्रमाणे तात्त्विक व व्यावहारिक धर्माचा जो प्रधान भाग त्याविषयी कोठे फारसा भेद येत नाही. भेद येतो तो येथे की, ज्या साधनांनी हे धर्मज्ञान मनुष्यास होते, अशी समजूत असते, त्या साधनांविषयी आग्रह धरण्यात. ह्या गौण गोष्टीस वेळोवेळी फाजिल प्राधान्य दिल्यामुळे धर्माच्या नकाशात किती चित्रविचित्र रंग भरले आहेत व किती हिडिस हेंदर साचली आहे, हे सांगण्यास येथे स्थळ नाही.

गौण भाग
वर जो साधनाविषयी आग्रह सांगितला, तो चार प्रकारचा. एक विभूतीप्रामाण्य, दुसरा ग्रंथप्रामाण्य, तिसरा मठ (Church) प्रामाण्य व चौथा रूढीप्रामाण्य. ज्या हिंदुधर्मातून ब्राह्म आणि आर्य हे पुढे आले त्यांची स्थापना ख्रिस्त-बुद्धासारख्या एकाच विभूतीकडून नियमित काली झाली नसल्यामुळे मूळ जुन्या हिंदुधर्मातच इतर धर्माप्रमाणे विभूतीविषयी हटवाद नाही. अवतारवादाविषयी जो आग्रह आहे तोही ब्राह्मांप्रमाणेच आर्यांनी सोडून दिला आहे. त्याचप्रमाणे तिसरा आणि चौथा आग्रह (अगर आचार्यपीठ) जो मठ आणि रूढीसंबंधाचा तोही आर्यांनी बिनबोभाट बाजूस ठेविला आहे. बाकी एक जो आग्रह उरला आहे आणि जो ब्राह्य आणि आर्य ह्यांच्यामधील अल्प आणि दिवसेदिवस कमी-कमी होत जाणा-या भेदाला कारण झाला आहे, तो ग्रंथप्रामाण्यासंबंधी होय. ह्या उरलेल्या आग्रहाची जागाही किती आकुंचित झाली आहे पहा. जुन्या मताप्रमाणे श्रुती, स्मृती, पुराणे आणि तंत्रे ही सारी पुस्तके हिंदू उपासनेला व व्यवहाराला प्रमाण मानली आहेत. क्वचित जरी काही हिंदू धर्माभिमान्यांनी ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ अशी हिंदू धर्माची व्याख्या केली आणि आर्यसमाजाला हिंदूत गणले, तरी तेवढ्यावरूनच हिंदुसमाजाला वेदच मान्य आहेत असे होत नाही. उलट आर्यांनी मात्र चार वेदांशिवाय बाकी सर्व पुस्तकांचा अधिकार बेलाशक झुगारून दिला आहे. बाकी उरले ते चार वेदांचे प्रामाण्य.

येथवर जे ब्राह्म आणि आर्य संगतीने चालले ते आता एकमेकांकडे टवकारून पाहून लागतात. जणू काय ह्या गोष्टीचा उलगडा झाल्याशिवाय पुढे त्यांना पाऊल टाकणे शक्यच नाही. जणू काय आतापर्यंत त्यांची संगती झाली ती ह्या गोष्टीच्या अज्ञानामुळेच. जणू काय बाह्य जगाचा जो विरोध आहे तो दोघांसही पुरेसा नाही. असो.

उगाच काही तर्कट लढवून दोघांचे नसते साम्य दाखवून ह्या खोट्या साम्याचा गळेबंद दोघांच्या गळ्यांत नकळत अडकविण्याचा माझा उद्देश नाही. तर जो भेद आहे तो कायमचा व अखेरचा आहे काय? आम्ही जे भेदाचे मोठमोठे डोंगर ओलांडून आलो, ते आता ह्या भेदाच्या सापासारख्या दिसणा-या दोरीला भिऊन निरनिराळ्या दिशेने एकमेकांपासून दूर पळावे काय? ह्याचा विचार दोघांनी करावा एवढाच आजचा हेतू आहे.

वेद शब्दाचा अर्थ करण्यात आमचे आर्य बंधू जे अलौकिक विचारस्वातंत्र्य दाखवितात, जे मनाचे औदार्य आणि प्रचाराची प्रगती दाखवितात, इतकेच नव्हे, तर आधुनिक सुधारणा आणि आधुनिक परिस्थिती ह्यांचा त्यांना कोठेच अडथळा न येता पुन: वेदाच्या प्रामाण्याविषयी त्यांचा जो आग्रह आहे तो पाहून वेदप्रामाण्यासंबंधाने त्यांची लौकिकापेक्षा काही तरी निराळी समजूत असावी असे वाटते. म्हणजे वेदाचे जे अर्थप्रामाण्य मानतात ते बाह्य नव्हे तर अंतरप्रामाण्य असले पाहिजे, आर्यांशी पुष्कळ वेळ बोलल्यावर शेवटी त्याची मजल येथवर जाते की वेद म्हणजे ही बाहेरली पुस्तके नव्हत तर सनातन ईश्वरीज्ञान होय. ह्या ठिकाणी आता

ब्राह्मांची प्रामाण्यबुद्धी
कशी आहे ती थोडक्यात सांगणे भाग आहे. ब्राह्मास त्याच्या बाहेर प्रमाणभूत वस्तू अशी काय ती एक ईश्वरच. त्याच्या प्रामाण्याचा बोध जो ब्राह्मास होतो तो बाहेरून नव्हे, तर त्याच्या अंतर्यामातून आणि विवेकबुद्धीतून. ह्यावरून ब्राह्मांना प्रमाणभूत असे काहीच नाही. ते स्वैर आहेत असे होत नाही. उलट ब्राह्मांचे असे म्हणणे आहे की, ज्यांना हे अंतरप्रामाण्य मान्य नाही किंवा पुरेसे ते ज्यास भासत नाही, तेच बाहेरच्या अनेकविध प्रामाण्यांच्या भानगडीत पडतात. आता जर कोणी ब्राह्मांस विचारतील की, अंतरप्रामाण्यात सर्वत्र सारखेपणा व निश्चितपमा कोठे आढळतो? तर त्यांचे सांगणे असे पडते की, बाह्य पुस्तकात व आचारात तर आतल्याहून अधिक धरसोड, उडवाउडव आणि अफरातफर आढळते आणि ती निवारण्यास पुन: आपल्या शुद्ध व सात्त्विक बुद्धीचाच उपयोग करावा लागतो, असो. ब्राह्मांनाही अंतरप्रामाण्य कबूल आहे हे निर्विवाद आहे. इतकेच नव्हे, तर ह्या दृष्टीने त्यांना हिंदूंचे वेदच काय पण निरनिराळ्या राष्ट्रांत निरनिराळ्या काळी ईश्वराकडून मानवी बुद्धीला ज्या ज्या प्रेरणा मिळाल्या आहेत त्या सर्व सारख्याच पूज्य व स्वीकरणीय आहेत. ईश्वरी शब्दांस रूकार देण्याचा मनुष्यास जो अनुपम अधिकार आहे, त्याच्या बळावर त्यानेच निरनिराळ्या काळी जे उदगार काढले आहेत त्यांना ईश्वरी म्हटले काय, मानवी म्हटले काय त्यांची योग्यता जास्त होत नाही की कमी होत नाही! ईश्वरी सत्य जे आहे ते सनातनच आहे पण त्याचा वेळोवेळी जो मानवी शब्दांनी स्फोट होतो तो देशकालांनी परिच्छिन्न असतो म्हणून शब्दांविषयी आग्रह न धरता सत्याविषयी आदर धरणे हेच प्रामाम्यबुद्धीचे खरे लक्षण आहे.

समेट
वर जो आपण धर्माचा प्रधान भाग पाहिला आणि त्यात ब्राह्मांचे व आर्यांचे ऐक्य आहे हे दाखविले त्या भागाचे आचरण करण्यात आपली शक्ती खर्च करावी की तो भाग अमुक ग्रंथात आहे आणि अमुक ग्रंथात नाही ह्याचा निर्णय करण्यात खर्चावी? केवळ सत्य आणि केवळ असत्य असा कोणताच ग्रंथ नाही, आणि मध्यंतरी कोणत्या ग्रंथात किती सत्य आहे हे पाहण्याचे काम, ज्यांनी आपले सर्व आयुष्य निरपेक्षपणे विद्याव्यासंगात वाहिले आहे अशा पंडितांचेच आहे. ते काम धर्मप्रचारकांनी आपल्याकडे घेतले. इतकेच नव्हे, तर अमुक एकच श्रुतिग्रंथ सर्वांशी प्रमाण आहे असा आग्रह धरला तर त्याच्यावर तीन प्रकारची जबाबदारी येते. पहिली ही की, ज्या ग्रंथाचे प्रामाण्य त्यास स्थापावयाचे आहे त्यातील सर्व विधाने हल्ली विकास पावलेल्या बुद्धीस पटतात हे दाखविण्याची. हिच्यामुळे त्या पुस्तकातील सर्व कथाभागाचा आणि त्या वेळच्या समजुतीचा आताच्या चालीरीतीला लागू पडेल असा अर्थ करण्यात येतो. दुसरी जबाबदारी ही की, आता अवगत झालेले सर्व सत्य त्यात आहे हे दाखविण्याची. ह्यामुळे मांसभक्षण व मद्यपान यांचाही निषेध वेदात आहे असे दाखविण्यात येते. तिसरी अत्यंत जोखमीची जबाबदारी ही की ह्याशिवाय इतर श्रुती आहेत त्या प्रमाण नव्हेत हे सिद्ध करण्याची. ही तिसरी जबाबदारी अत्यंत शोचनीय आहे. हिला कोणत्याही श्रुतीत आधार नसून प्रत्येक ग्रंथाभिमानी ती बळेच आपल्यावर ओढून घेतो.

वर सांगितलेल्या ह्या तीन जोखमा आमचे आर्य बंधू आपल्यावर विनाकारण घेतात. वेदप्रामाण्यासंबंधी त्यांनी थोडा खोल विचार केला तर त्यांच्यात व ब्राह्मांत फार मोठा भेद राहणार नाही. जरी किंचित राहिला तरी, प्रधान भागात जे त्या दोघांचे ऐक्य आहे आणि गौणभागातही त्याचा पुष्कळ भेद नाहीसा झाला आहे हे पाहून दोघांनीही आपला धर्मसुधारणेचा एकत्र इष्ट हेतू आता अधिक एकीने करायला पाहिजे आहे.

ब्राह्मांनी श्रुती अगदी टाकल्या आहेत असे नाही, तर उलट सर्वच जगातल्या श्रुती त्यांनी स्वीकारल्या आहेत हे वर सांगितले. पण ह्यापेक्षाही आर्यांनी हे ध्यानात घ्यावे की ब्राह्मांस वेदाचा जो शेवटचा व उत्तम भाग उपनिषदे ही पूर्ण मान्य आहेत, इतकेच नव्हे तर भगवदगीता आणि आधुनिक तुकाराम, नानक, चैतन्यादी साधूंचे प्रयत्नही ब्राह्मांस पटत आहेत, आणि त्यांच्याच वचनाच्याद्वारे मंदिरात उपेदशही होत असतात. ह्यापुढे ब्राह्म आणि आर्य ह्यांमधील भेद जर झपाट्याने कमी व्हावा असे दोघांना वाटत असेल तर दोघांनी परस्परांचे रहस्य जाणले पाहिजे. ते असे. ब्राह्मांनी आपल्या सार्वत्रिक व सनातनधर्माची तत्त्वे हिंदुस्थानवासीयांस विशेषे लवकर कळवावी आणि आर्यांनी ह्याच सनातन धर्माची तत्त्वे वेदांतून काढताना शब्दांची वाजवीपेक्षा जास्त ओढाताण करू नये. इतकेच नव्हे तर हा सनातनधर्म सर्वत्र आहे, हे सहज कळविण्यासाठी ती सर्व धर्मग्रंथांतून होता होईल तितकी काढावीत. ह्याशिवाय दोघांचे व्हावे तसे ऐक्य होणार नाही किंवा धर्माची सुधारणा करणे हा दोघांचा हेतू तोही पूर्ण तडीस जाणार नाही.

ब्राह्म आणि आर्य हे दोघेही जर उदार मताचे आणि प्रगतीपर आहेत, तर दोघांचे ऐक्य केव्हा तरी झालेच पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेतील युनिटेरिअन लोक, युरोपातील उदार प्रॉटेस्टंट आणि हिंदुस्थानातील ब्राह्म हे भूगोलात व इतिहासात एकमेकांपासून इतके दूर असूनही आणि त्यांच्या आताच्या चालीरीती व मूळचा धर्मही इतका अत्यंत भिन्न असूनही ह्यांच्यात अलीकडे किती तरी ऐक्यभाव व प्रेम वाढत आहे आणि परस्परांस मदत करीत आहेत. पण आर्य आणि ब्राह्म हे सख्खे बंधू, एकाच धर्मातले, एकाच देशाच्या उद्धारासाठी झटणारे असूनही हे परस्परांपासून नेहमी इतके स्वतंत्र, कित्येकदा अगदी उदासीन व क्वचित प्रसंगी एकादा
दुस-याला टाकूनही बोलतो ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे!

नावारूपाने दोघे जरी आज एक होणे शक्य नसले तरी जे पुष्कळ कार्य दोघांस जोडीने करता येईल त्यात कोणीही तटस्थ राहूं नये.

ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज

(रविवार ता. २१-५-११ रोजीं कोल्हापूरच्या ब्राह्मसमाजाच्या वार्षिकोत्सवामध्यें दिलेलें व्याख्यान.)

एकाद्या वृक्षाची साल आणि त्याचा गाभा ह्यांच्यामध्ये परस्पर जो संबंध आहे, तोच संबंध ब्राह्मसमाज व ब्राह्मधर्म ह्यांमध्ये आहे. वृक्षाच्या सालीमध्ये कालांतराने फेरफार होतो, पण गाभा तोच असतो. ह्याप्रमाणे ब्राह्मसमाजाचे जरी रूपांतर होणे शक्य असले, तरी ब्राह्मधर्म हा सनातनच राहणार म्हणून त्याची तत्त्वे काय आहेत ते आपण प्रथम पाहू.

प्रथम तत्त्व, मोकळा विश्वास हे आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्धी अथवा विवेक म्हणून एक शक्ती आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये श्रद्धा अथवा विश्वास अशी एक शक्ती आहे. विश्वास असावयास पाहिजे, असे आमचे म्हणणे नाही, पण तो प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीअधिक मानाने असतोच, असे आमचे म्हणणे आहे. आणि ह्यासंबंधाची ब्राह्मधर्माची पहिली आज्ञा अशी आहे की, तो विश्वास मोकळा ठेवावा. त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध अथवा दडपण असू नये. काही स्वाभाविक कारणांनी आपला विश्वास कमी होत असेल, किंवा नष्ट होत असेल, तर तसे होऊ द्यावे, पण अन्य काही कारणाने नवीन विश्वास उत्पन्न होत असेल किंवा जुना दृढ होत असेल तर ते मात्र होता देऊ नये असे म्हणणे काही मोकळ्या विश्वासाचे लक्षण नाही. विश्वासास दोन्ही बाजूंनी मोकळे ठेविले पाहिजे. त्याच्या जाण्याच्या किंवा येण्याच्या मार्गावर कसलेही कृत्रिम दडपण ठेवणे हा अधर्म होय, कारण ज्या अर्थी विश्वास ही आपली एक नैसर्गिक उपजत देणगी आहे त्या अर्थी तिला इतर कृत्रिम उपायांची जरूरी नाही, इतकेच नव्हे, तर तिला त्यांची बाधा न होऊ देणे हे आपले कर्तव्य आहे.

दुसरे तत्त्व, वाढते ज्ञान हे होय. आम्ही आपले ज्ञान वाढणारे आहे की नाही ह्याची नेहमी खबरदारी घेतली पाहिजे. अद्वैतवाद्यांचा अदवैत सिद्धांत हे वाढते ज्ञान नव्हे, जे आहे ते एकच तत्त्व आहे असा एकदा मनाचा ग्रह झाला की मनाची गतीच खुंटली असे होते. पुढे जाणावयाचे ते काय आणि नेणावयाचे ते काय? ह्या कारणामुळे ब्राह्मधर्मानुयायांच्या पसंतीस अद्वैतवाद उतरत नाही. एरवी ब्राह्मसमाज अद्वैतवादी आहे किंवा द्वैतवादी आहे ह्याची चर्चा करण्याच्या भानगडीत पडण्याचे कारण नाही. नित्य नवे नवे जे अनुभव येतात आणि सोध लागतात, त्यांची किंमत नाहीशी करून टाकणारा अद्वैतवाद ब्राह्मास रूचत नाही. कारम व्यक्तीस येणा-या ह्या एकाद्या लहानशाही ताज्या अनुभवाची किंमत शिळ्या अद्वैतवादापेक्षा मोठी आहे. येणेप्रकारे प्रत्येक व्यक्तीस जे अनुभव येतात आणि तत्कालीन मनूमध्ये जे भोवताली नानाप्रकारचे शोध लागतात, त्या सर्वांचा सुसंस्कार त्या व्यक्तीच्या मनावर होऊन अखेरीस तिला जी पूर्ण प्रज्ञा प्राप्त होईल ती देखील प्रगमनशीलच असणार ह्याशिवाय ज्ञानाची इतर कोणतीही स्थिती ब्राह्मास संभवनीय दिसत नाही. त्याप्रमाणे विश्वास मोकळा ठेवण्यात, त्याचप्रमाणे ज्ञान वाढते ठेवण्यातही ब्राह्मास कोणत्याही प्रकारचा धोका दिसत नाही. उलट ही त्याची आवश्यक कर्तव्ये आहेत.

तिसरे तत्त्व शुद्ध प्रीती हे होय. “ऐसी कळवळ्याची जाती| करी लाभाविण प्रीति” ह्या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपली प्रीती लाभावीण असली पाहिजे. शुद्ध प्रीती नुसती लाभावीण असते, एवढेच नव्हे, तर त आणि तिचा विषय ह्यांच्यामध्ये स्थळ आणि वेळ ह्यांचे कोणतेच अंतर राहू शकत नाही. सर्व विश्वाचे आपण मध्यबिंदू होऊन सर्वांवर आपण प्रीती करू लागतो. ह्याप्रमाणे निरंतर आणि निर्लोभ प्रेम ब्राह्मधर्माचे तिसरे आवश्यक लक्षण होय.

चौथे लक्षण सात्विक सेवा होय. वरील प्रेमाच्या योगे सेवा करीत असताना मनास कोणत्याही प्रकारे निराशा आणि शीण होण्याचा संभव नसतो. आजपर्यंत केलेले प्रयत्न केले नसते तर बरे झाले असते, असे म्हणण्याची पाळीच येत नाही. कारण ही सात्विक सेवा करीत असताना प्रतिक्षणी आनंदच होत असतो. तो आनंद पुढे कधी तरी व्हावयाचा आहे असे नसते, शिवाय पदोपदी अधइक सेवा करण्याची शक्ती वाढतच जाते. म्हणून ही सात्विकसेवा असे म्हटले आहे.

येणेप्रमाणे सारांशरूपाने ब्राह्मधर्माचे स्वरूप आहे. ह्या धर्माची संस्थापना राममोहन रॉय यांनी केली असे म्हणता येत नाही. ह्यावर वेळोवेळी जी काही अनिष्ट वेष्टमे पडत आहेत, त्यांचे निराकरण करून ही तत्त्वे अधिक उज्ज्वल करण्याचा नवीन प्रारंभ राममोहन रॉय ह्यांनी सन १८३१ साली केला. पण वर सांगितल्याप्रमाणे झाडातील गाभ्याच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे सालीची जरूरी आहे. त्याचप्रमाणे ह्या सनातन तत्त्वांचा योगक्षेम  चालण्यासाठी नवीन रचनेची आणि पद्धतीची जरूरी आहे. त्याचे नाव ब्राह्मसमाज आणि त्याची स्थापना राममोहन रॉय ह्यांनी केली. मनुष्याच्या अंत:करणामध्ये स्वाभाविकपणे वागत असलेल्या वरील ब्राह्मतत्त्वांची उघाडणी आणि विकास व्हावा म्हणून अशा समाजाचा देशोदेशी, प्रांतोप्रांती आणि गावोगावी प्रसार करणे आवश्यक आहे, तसा समाज ह्या कोल्हापूर शहरात स्थापन होऊन हा वार्षिकोत्सव साजरा करण्यात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. तथापि ब्राह्मधर्माच्या सनातनपणात बाधा येत नाही. यद्यपि सालीमुळे गाभ्याला वेष्टण पडून त्याच्या स्वतंत्रपणास बाधा येते, किंबहुना सालीच्या दोषामुले गाभ्यावर विकारही घडतो, तथापि सालीशिवाय गाभ्याची स्थिती आणि वाढ शक्य नाही म्हणून सालीचे महत्त्व लक्षात आणलेच पाहिजे. पण एकादे जुनाट झाड आतून पोकळ होऊन नुसती वरील साल मात्र रहाते आणि असे झाले असता ते केव्हातरी जसे खाली गळून पडतेच तशीच निरनिराळ्या काळी ह्या धर्मपंथांची वाट लागते हे आपण विसरू नये. ह्या नियमास ब्राह्मसमाजही अपवाद होणार नाही. कालांतराने ब्राह्मधर्माची जीवनत्त्वे हल्लीच्या समाजातून नाहीशी झाली तर अन्य रीतीने त्याच्यावर निराळे नवीन वेष्टण येईल, पण ब्राह्मधर्माचा मनुष्यजातीतून अजीबात नायनाट होणे नाही. हा शाश्वत संबंध ध्यानात ठेवूनच समाजाचा ठिकठिकाणी प्रसार करण्याचे काम प्रत्येक ब्राह्माने करावयास पाहिजे. सर्व हिंदुस्थानभर किंबहुना जगभर ब्राह्मसमाजाचा विस्तार झाला, पण त्यामध्ये प्रत्यक्ष ब्राह्मधर्मालाच जर अवशेष राहिला नाही, तर रानातल्या झाडाच्या जुन्या ढोल्कयाप्रमाणे ह्या समाजाची स्थइती होईल व त्याचे मह्त्त्व सर्पणापेक्षा जास्त उरणार नाही हे जरी खरे आहे, तरी सनातन ब्राह्मधर्मतत्त्वांची वाढ ह्या किंवा अशा समाजाशिवाय होणे केवळ अशक्य आहे. समाजदोषाने तत्त्वे थोडीबहुत दूषित होणारच, आणि शेवटी समाजाचा अजीबात लयही होणार, असे असताही समाजाशिवाय धर्मतत्त्वास गत्यंतर नाही हे जाणून प्रत्येक ब्राह्माने आपल्या समाजाचा योग्य अभिमान राखून ह्याचा सतत योगक्षेम चालविणे जरूर आहे. आपले कलेवर कधीतरी विलयाला जाणार, आत्मा अविनाशी आहे, कलेवराची बाधा आत्म्याला होते, ह्या गोष्टी कितीही ख-या असल्या म्हणून आम्ही आपल्या शरीराची जोपासना करणे सोडून देणे हे जसे मूर्खपणाचे आणि घाताचे होणार आहे, तसेच आपल्या समजाविषयी उदासीन रहाणे हेही आत्मघातकीपणाचे होणार आहे. समाजाची खटाटोप सोडून देऊन सनातन ब्राह्मतत्त्वाचे आचरण करू पाहणारी एकादी ब्राह्मव्यक्ती अन्नपाणी वर्ज्य करून मोक्षास जाऊ इच्छिणा-या बुद्धिभ्रष्टाप्रमाणेच आहे असे समजण्यास काहीच हरकत नाही. त्याचे जीवित ज्याप्रमाणे एक दोन दिवसांत बंद पडेल, त्याचप्रमाणे ह्या ब्राह्मव्यक्तीचेही ब्राह्मधर्माचरण अल्पकाळांतच नष्ट होईल.

  1. बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार
  2. बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास
  3. बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट !
  4. बेन लोमंड शिखरावरील समाधि
  • 96
  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
Page 101 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी