1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार

(पुणें येथील जॉन स्मॉल हॉलमध्यें ता. १६ एप्रिल १९१० रोजीं झालेल्या व्याख्यानाचा सारांश.)

व्याख्यान जुळवून आणणारे, व्याख्यानाचे स्थळ व प्रसंग, श्रोते आणि वक्ता ह्यांपैकी कोणीही बौद्धधर्माचे नसताना ह्या विषयावर व्याख्यान का होत आहे, अशी शंका येणे साहजिक आहे. प्रस्तुत विषयाचा समाजशास्त्राच्या दृष्टीने विचार करावयाचा आहे. कोणत्याही लोकांची धर्मसंबंधी मते, विश्वास, विधी आणि व्यवहार ही सर्व त्या लोकांची सामाजिक प्रगती किती झाली आहे हे पाहण्याची मुख्य साधने होत; व समाजशास्त्राच्या अध्ययनाची मुख्य सामग्री म्हणण्यासही हरकत नाही. आधुनिक समाजशास्त्राचे प्रधान आचार्य स्पेन्सर साहेब हे होत. इतर भौतिक शास्त्रे ज्या स्वयंभू नैसर्गिक बाह्य नियमांनी बांधली गेली आहेत, त्याच नैसर्गिक नियमांचा अम्मल मानवी समाजाची उत्पत्ती, वाढ व लय ह्या गोष्टींतही आहे, हे मत स्पेन्सरने जोराने प्रतिपादिले आहे. स्पेन्सरचे मत समाजशास्त्र (Sociology) हा जीवनशास्त्र (Biology) ह्यांचा एक केवळ खांब आहे असे होते, पण ह्या मतात अलीकडे बरीच सुधारणा होत चालली आहे. व्याख्यात्यांनी ह्या ठिकाणी प्रो. मॅकॅन्झी ह्यांच्या ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजातील ह्युमॅनिझम “Humanism” वरील व्याख्यानातील एक उतारा वाचून दाखविला. त्यातील आशय असा होता की, खालील प्राण्यातील व्यक्तीच्या व जातीच्या पूर्वेतिहासाचा परिणाम तिच्याच वर्तमान व भावी जीवनक्रमावर घडतो. पण तो तिला कळून येत नाही. मनुष्याला हा घडून येणारा परिणाम समजतो, इतकेच नव्हे तर मनुष्य जाणूनबुजून आपल्या व्यक्तीच्या तशाच जातीच्या पूर्वेतिहासातील महत्त्वाच्या गोष्टींचा फायदा घेऊन त्यांच्या बळावर आपला पुढील आयुष्यक्रम रचीत असतो व ह्यातच त्याचा मनुष्यपणा खालील प्राण्यांहून विशेष आहे. ह्यावरून समाजशास्त्र हा केवळ जीवनशास्त्राचा एक भाग आहे, ही समजूत अपूर्ती ठरते.

बौद्धधर्म हा आमच्या लोकांच्या पूर्वेतिहासातील एक केवळ महत्त्वाचा भाग आहे. इतकेच नव्हे तर तो आमच्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा एक मोठा घटक आहे. ही जाणीव आम्ही आमच्यामध्य ठेविली नाही म्हणून वस्तुस्थिती तशी नाही असे होणार नाही. आमचे जीवन मात्र पशूप्रमाणे जाणीवहीन, आणि केवळ बाह्य नियमांच्या बळावर वाहत चालले आहे, असे होईल. बौद्धधर्म हा आमचा बिनमोल वारसा आहे. त्याची नुसती जाणीव ठेवूनच तृप्त न राहता मागे काय झाले असेल ते असो. अत:पर त्यावर आपला अभिमानाने हक्क शाबीत करून आम्ही त्याचा लाभ घ्यावयाला पाहिजे आहे. ह्या दृष्टीने पाहता आजचा विषय नुसता समाजशास्त्राच्या अध्ययनाचाच नसून तो समाजसुधारणेचाही आहे असे दिसून येईल. पण खरोखर तो ह्याहीपेक्षा जास्त आहे. व्याख्यात्यांनी स्वत:ला ज्या धर्मसंप्रदायाला वाहून घेतले आहे, त्याची त्यांना अशी आज्ञा आहे की, सर्व धर्मांचे चौकस व निरपेक्ष बुद्धीने संशोधन व तुलना करून त्यातून जे सारभूत सत्य निघेल त्याच्या आधारे दुस-याची सेवा व स्वत:ची उन्नती करून घ्यावी व हेच काय ते खरे धर्माचरण समजावे. ह्या दृष्टीने आजचे व्याख्यान उज्ज्वल धर्माची एक लहानशी कामगिरीच होय.

भगवान गौतमबुद्धाने शिकविलेले धर्मसिद्धांत, त्यांनी घालून दिलेले आचरणाचे नियम व रेखाटलेली ध्येये ह्यांचा समग्र विचार करण्याची आज जरूरी नाही व तसे करण्यास अवकाशही नाही. अलीकडे प्रसिद्ध होणा-या कोणत्याही पुस्तकात ती सापडतील. त्या सर्वांच्या सामान्य लक्षणांपैकी काही मुख्य लक्षणांचा ऊहापोह करणे हे आजच्या प्रसंगाला अनुसरून आहे.

लक्षण १ लें - बुद्धाच्या सिद्धांताचे पहिले लक्षण म्हणजे त्याची अत्यंत सयुक्तिकता हे होय. आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये ऑगस्ट कॉम्ट ह्याने जो निश्चितज्ञानवाद (Positivism) सुरू केला, त्याचा उपक्रम गौतमबुद्धाने जवळजवळ १५०० वर्षांपूर्वीच ह्या देशात केला होता. एकापक्षी अंधविश्वास, अंधकल्पना, पोकळ तर्क, रूढी अथवा आत्मवाक्याचे अवलंबन इ. मनाचे जे हीन दर्जाचे व्यापार व अन्यपक्षी श्रद्धा, प्रेरणा, प्रतिभा इत्यादी उच्च दर्जाचे जे व्यापार आहेत, त्या दोन्हींपासून सारखेच अलिप्त राहून तथागताने आपले सिद्धांत स्थापित करण्याचा शक्य तो प्रयत्न केला आहे. म्हणून त्याच्या शिक्षेत चमत्कार, गूढ तत्त्वे, गुप्तज्ञान वगैरेंना थारा नाही. इतकेच नव्हे तर मानवी बुद्धिशिवाय ज्ञानाची इतर द्वारे त्याने जणू काय बंदच केल्यामुळे त्याचे सिद्धांत काही अंशी नीरस आणि नैराश्यजनक भासण्याचाही संभव आहे. पण ते काही असो, इतक्या प्राचीन काळी तथागताने कडकडीत युक्तिवादाची इतकी शिकस्त केली हे पाहून रीस डेव्हीडसारख्या आधुनिक युक्तिवाद्यासही त्याचे कौतुक केल्यावाचून राहवत नाही. पण युक्तिवादाची शिकस्त करणे ह्यातच बौद्ध सिद्धांताच्या पहिल्या लक्षणाची  परिसमाप्ती होत नाही. युक्तिवाद आणि बुद्धिवाद ह्यांत पुष्कळ फरक आहे. साहजिक विचाराने एकादी गोष्ट युक्त किंवा अयुक्त दिसेल तशी ती बरी किंवा वाईट ठरविणे व त्याप्रमाणे वागणे हा युक्तिवाद होय. आणि मानवी बुद्धीच्याच द्वारे सर्व सत्याचा निर्णय करण्याचा आग्रह धरणे व मानवी बुद्धीने ठरविलेले तत्त्व तेच अखेरचे सत्य मानणे हा बुद्धिवाद होय. मनुष्य स्वाभाविकपणे युक्तिवादाच्या साहाय्याने विचार करू लागला म्हणजे सहजच त्याच्या युक्तिवादाचा परिणाम वरील बुद्धिवादात होतो. पण तेथेच त्याची वाढ थांबत नाही, तर लवकरच त्याच्या बुद्धिवादाचा विकास विज्ञानवादात होतो. म्हणजे आपल्या बुद्धीनेच अंतिम सत्य ठरविण्याचा आग्रह कमी होऊन अंतिम सत्य म्हणून काही कायमची वस्तू आहे, तिला कशाचीही अपेक्षा किंवा अवलंब नसता ती केवळ निर्गुण आहे, अशा प्रकारचा आग्रह वाढू लागतो. शेवटी निरनिराळ्या दर्शनकारांनी ह्या ‘केवला’ ची किंवा ब्रह्माची किंवा ‘निर्गुणा’ ची निरनिराळ्या रीतीने उपपत्ती केल्यावर त्याच्या सामान्य अनुयायी समूहामध्ये वरील युक्तिवाद, बुद्धिवाद, किंवा विज्ञानवाद हे तिन्ही मावळून जाऊन त्यांचे अखेरचे पर्यवसान  जो हटवाद तो मात्र कायम राहतो. भगवान गौतमबुद्धाने आपल्या युक्तिवादामध्ये बुद्धिवादाचाही आग्रह शिरू दिला नाही. मग पुढील आपत्तीपरंपरेचा तर प्रश्नच उरला नाही.

युरोपातील मध्ययुगातील हटवादाशी झगडण्यासाठी प्रथम साहजिक युक्तिवादाचा उदय झाला. त्याचा विकास १८ व्या व १९ व्या शतकांतील आधुनिक बुद्धिवादात (Rationalism) व केवलवादात (Absolutism) झाला. ह्या दोन्ही वादांतील आग्रहाचा भाग तेवढा निरस्त करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत हल्ली पुन: युक्तिवाद आणि व्यवहारवाद अधिक व्यवस्थित रीतीने व नेटाने मांडण्यात येत आहे. लंडनमध्ये शिलर आणि ड्यूवेप्रभृती, फ्रान्सात प्रो. बर्गसन् आणि इतालीत सिनोर पॉपिनी ह्या मंडळीने (Humanism) ह्या नावाने व अमेरिकेतील प्रसिद्ध तत्त्ववेत्ता प्रो. वुइल्यम जेम्स प्रभृतिमंडळीने (Pragmatism) व्यवहारवाद ह्या नावाने वरील बुद्धिवाद आणि केवलवादाच्या उलट चळवळ करण्याचा तर अगदी विडाच उचलला आहे. ह्या नवीन विचारक्रांतीच्या दृष्टीने पाहता खालील उता-यावरून बौद्ध विचाराची पद्धत २० व्या शतकातल्याप्रमाणे अगदी ताजी होती असे दिसते.

बॅक्ट्रिया देशातील सागलचा राजा मिलिंद (Menander) ह्याने नागसेन नावाच्या बुद्ध भिक्षूला प्रश्न केला-“तुमचे नाव काय?” भिक्षूने उत्तर केले, “माझे आई बाप, माझे सोबती व इतर मला ‘नागसेन’ ह्या शब्दाने  हाक मारितात, पण तेवढ्यावरून ‘नागसेन’ म्हणून काही निराळीच वस्तू आहे से आपण समजू नये.”

राजा म्हणाला,-‘काय! नागसेन म्हणून काहीच वस्तू नाही, तर तुमच्या पापपुण्याचा अधिकारी कोण? तुम्ही मिथ्यावादी आहा...’ नागसेनाने राजास उलट प्रश्न विचारला, ‘राजा, आपण ज्या रथात बसून आला तो रथ म्हणजे त्याचे चाक काय? जू काय? वरील छत्र काय? सारथी काय? घोडे काय? वरील ध्वज काय?’ इ. ह्या सर्व बारीक प्रश्नांस राजाने नकारार्थी उत्तर दिल्यावर नागसेनाने पुनः विचारले,-‘....ही सर्व पृथक् साहित्ये रचून ठेविल्यास जो ढीग होईल तो रथ होईल काय? किंवा ही एकत्र रचलेली साहित्ये काढून घेतली असता मागे रथ म्हणून काही उरेल काय?...’ ह्याही प्रश्नास राजास नकारार्थीच उत्तर द्यावे लागले. तेव्हा नागसेनाने राजास म्हटले ‘राजा, आपणही मजप्रमाणेंच मिथ्यावादी ठरतां.’

ह्याप्रमाणे निरर्थक आणि दुराग्रही केवलवादाच्या उलट भगवान् बुद्धाची शिक्षा होती. ते नास्तिक नव्हते, केवळ (Pragmatist) व्यवहारवादी होते. तथापि तत्कालीन ब्राह्मणांनी व मध्ययुगातील शंकराचार्यांनी त्यांना नास्तिक ठरविले. इतकेच नव्हे इतर प. लोकवासी राजारामशास्त्री भागवतासारख्या विचारी आधुनिकांनी देखील ‘बौद्धधर्म म्हणजे अंधार’ शी हूल उठवावी हे किती आश्चर्य?

लक्षण २ रें - बौद्ध सिद्धांत ज्याप्रमाणे सयुक्तिक असून केवळ पोकळ, तार्किक किंवा विज्ञानवायूने भरलेले नसत, तर उलट निश्चित व्यवहारवादी असत. त्याप्रमाणेच बौद्धधर्माचरणही पूर्णपणे प्रागतिक असून शिवाय उलटपक्षी अत्यंत सहिष्णुतापर व सहानुभूतिपर असे. सुधारक झाला की तो सहिष्णु झालाच असे पुष्कळ वेळां आढळून येत नाही. मताने मात्र कडकडीत प्रागतिकता मिरविणे, त्यातही केव्हा केव्हा कचरणे, पण कृतीचे वेळी सपशेल अंग चोरणे आणि उलट केवळ आपल्या विचारसुधारणेच्या जोरावरच पुराणपक्षाशीरणे माजविणे असली खोटी सुधारक लक्षणे दुर्दैवाने इतिहासात वेळोवेळी आढळून येतात. बौद्धधर्मातील आचार अशा कोटीतला मुळीच नव्हता.

परवा चवथ्या प्रांतिक सामाजिक परिषदेची बैठक काशी येथे झाली त्यावेळी परिषदेच्या स्वागत कमिटीच्या अध्यक्षांनी मोठ्या अभिमानाने सांगितले की, हिंदुस्थानातील आद्य सुधारक श्रीगौतमबुद्ध ह्याने आपल्या सुधारणेच्या मंगल कार्यास ह्याच पुण्यक्षेत्री सुरूवात केली आणि खरोखरीच तेव्हापासून ह्या मंगलकार्याचा ओघ आमच्या देशात अप्रतिम वेगाने व सर्व बाजूंनी चालला होता. स्त्रियांस पुरूषांप्रमाणेच हक्क होते; किंबहुना धर्मप्रसाराचे कामी देखील स्त्रिया पुढाकार घेत होत्या. सिव्हलद्वीपात धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोक राजाने प्रत्यक्ष आपल्या कन्येस दीक्षा देऊन पाठविले. पशुमेध, नरमेधादिकांचे क्रूर प्रकार, विधिवैकल्याचे वेडेचार आणि अशा सर्वच प्रकारच्या धर्मभ्रमाचे पटल ह्या नवीन धर्माने दूर केले. हिंदुस्थानातील बद्धमूल झालेल्या ज्या जातिभेदाचे निरसन करण्याचे कामी ख्रिस्ती धर्माला, किंवा त्याहून करड्या महंमदी धर्मालाही पूर्ण यश आलेले नाही. त्या जातिभेदाला आणि वर्णभेदाला श्रीगौतमाच्या धर्मछत्राखाली थाराच मिळेनासा झाला. कारण विहितधर्माचे आचरण करण्याचे बाबतीत तथागताने अर्धवटपणाचे किंवा तिशहाणपणाचे अवलंबन कधीच केले नाही. पण चमत्कार हा की जे कोणी आग्रहाने एकादी सुधारणा घडवून आणतात त्यांच्या त्या आग्रहाची धुमी एकदम पेटली म्हणजे मग तिच्यात परपक्षविषयक सहिष्णुतेची, सहानुभूतीची किंबहुना सदयतेची देखील आहुती पडते, ते त्यास कळत नाही किंवा कळले तरी त्याची ते पर्वा करीतनासे होतात. प्रॉटेस्टंट लोकांना रोमन कॅथॉलिकांचा व प्युरिटन पंथाच्या लोकांना पूजाविषयक विधींचा व उपकरणांचा कसा तिरस्कार येतो किंवा मुसलमानांनी धर्मसुधारणेच्या नावाने  मूर्तिपूजकांचा किती छळ केला ह्या उदाहरणांवरून सुधारकांच्या असहिष्मुतेविषयी काही अंशी तरी कल्पना करता येईल.

बौद्धधर्माचा प्रसार असा नाही. स्वतःगौतमानेच काय पण त्याच्या कोणत्याही अनुयायाने सुधारणा घडवून आणण्याच्या आपल्या आवेशाला स्वत:च्या सहिष्णुतेचा बळी दिला असल्याने उदाहरण कोठेच आढळत नाही. उलट असा प्रकार पुष्कळदा घडण्याचा उल्लेख आहे की, परधर्मीयांनी तथागताकडे वादविवाद करण्यास यावे व तथागताचे विचार, विनय व प्रसन्नता पाहून वादात हार जाऊन शेवटी त्याच्याच धर्माचा उघड स्वीकार करण्यास तयार व्हावे व अशा समयी तथागतानेच उलट त्यास आपला जुना पंथ अशा उतावीळपण एकाएकी सोडण्याचे कारण नाही म्हणून त्यातलीच चांगली बाजू त्यांना, दाखविण्याचा प्रयत्न करावा. लालूच दाखवून किंवा जबरी करून केवळ आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्याची प्रवृत्ती बौद्धधर्मात कधीच नव्हती. हिंदुस्थानात किंवा जेथे बौद्धधर्माचा प्रसार झाला आहे अशा चीन, जपान देशांत तेथील पूर्वीच्या धर्मानुयायाशी मिळून मिसळून राहण्याचा प्रथमपासूनच कल आहे. पण ह्या अपूर्व सौम्यतेचे कारण आपला धर्म वाढला काय किंवा न वाढला काय ह्याविषयी बेपर्वाई किंवा नेभळेपणा होता असेही नाही. धर्मप्रसारासाठी गौतमाने स्वत: जसे आपले राज्य, तरूण भार्या आणि नूतन बालक ह्या सर्वांवर पाणी सोडले, तसाच स्वार्थत्याग करणारे हजारो भिक्षू त्याला त्याच्या ह्यातीतच मिळाले आणि मागाहून त्यांची परंपरा कायम राहिली म्हणूनच एके काळी बौद्धधर्म बहुतेक आशिया खंडभर पसरला व अद्यापि जगातील एक-तृतियांशावर लोकसंख्या त्या धर्माची आहे, ह्याप्रमाणे मतासारखी कृती करण्याचे शौर्य, आपले मत व आचार दूरवर पसरण्याचे वीर्य, परमत-सहिष्णुता व सहानुभूती ह्या वृत्तीचे औदार्य इ. परस्पर भिन्न गुणांचा समावेश एका गौतम बुद्धाच्या धर्माशिवाय इतरत्र सापडणे दुर्मिळ ह्यात शंका नाही.

लक्षण ३ रें - बौद्धधर्म निश्चितवादी, व्यवहारवादी आणि प्रागतिक होता. ह्यावरून तो केवळ जडवादी व ऐहिक गोष्टीतच गुरफटलेला असा होता असे नव्हे. बौद्धधर्मातील विरक्ती आणि निर्वाणविषयक अत्युच्च आध्यात्मिक आदर्श सर्वश्रुत आहेत. बौद्धधर्मातील प्रचारक भिक्षूंना कडकडीत वैराग्य पाळावे लागत असे. पण त्यासंबंधीही श्रीगौतमांनी मध्यमा प्रथिपत्तीचा मार्ग घालून देऊन विरक्ती किंवा विषयासक्ती ह्या दोन्हींचाही अतिरेक होऊ न देण्याची खबरदारी घेतली होती. ह्या मध्यमाप्रतिपत्तीच्यायोगे बुद्धभिक्षूंना कडकडीत वैराग्य असताही त्यांचे इतरत्र दिसून येणारे दुष्परिणाम त्यांना भोवले नाहीत. म्हणजे त्यांच्यातील सहृदयतेच्या प्रवृत्तीचे झरे आटले नाहीत. सहृदयतेचे दोन प्रकार आहेत. एक भूतदया व दुसरी सदभिरूची. भूतदया हा तर बुद्धाच्या शिक्षेचा विशिष्ट गुण होय. पण ब्राह्मणाचे रक्त ढेकणांना पाजणे हा अलीकडच्या जैनधर्मात आढळणारा अहिंसेचा प्रकार बौद्धामध्ये नाही. पशुयज्ञातील केवळ पशूंची प्राणहानी पाहूनच नव्हे तर पशूंचे हे अत्यंत हाल होत असत त्यामुळे श्रीगोतमाच्या कोमल अंत:करणास पाझर फुटला आणि त्यांनी सर्व प्रकारची हवने व क्रूर विधी बंद केले. त्यामुळे सर्वत्र मांसभक्षण बंद झाले असे नाही, तरी हल्ली भरतखंडात जो निर्मांसाहार प्रचलित झाला आहे त्याचे बरेच श्रेय बौद्धधर्माकडेच आहे. वैद्यशास्त्राचे शोध लावण्यासाठी प्राण्याच्या शरीरावर जिवंतपणी जे कठोर प्रयोग करण्यात येतात, त्याच्या प्रतिबंधार्थ हल्ली पाश्चात्य देशात जोराची चळवळ चालू आहे. पण ही चळवळ करणा-यांत सर्वच निर्मांसाहारी आहेत असे नाही. ह्या मंडळीमध्ये जरी केवळ क्रूरता आणि क्लेशनिवारण करण्यापुरतीच अहिंसा असते, तशीच बौद्धधर्मातही आहे. तिच्यात हिंदूंचा सोवळेपणा किंवा जैनांचा वेडगळपणा ही दोन्ही नाहीत.

सहृदयतेचा दुसरा प्रकार जी सदभिरूची ह्याविषयी ‘चीन देशातील बुद्धधर्म’ ह्या ग्रंथाचे कर्ते रेव्ह. बील (हे चीन देशात पुष्कळ दिवस राहिलेले ख्रिस्ती मिशनरी आहेत, त्यांची बुद्धधर्माविषयी पक्षपातबुद्धी असण्याची मुळीच भीती नाही.) हे म्हणतात की, चीन देशात बौद्धधर्मी लोकांनी सुंदर देवळे बांधून चित्रकला आणि शिल्पकला ह्यांची मोठी अभिवृद्धी केली. तसेच सुंदर बागांतून चित्रविचित्र नवीन फुलांची लागवड करून व त्यांची आपल्या उपासना मंदिरातून नित्य नैमित्तिकप्रसंगी थाटाची मांडणी करून लोकांच्यासदभिरूचीची पुष्कळ वाढ केली.

ह्यावरून बुद्ध भिक्षू म्हणजे अलीकडच्या बैराग्यासारखे सर्व संसारावर रूसलेले सदा असंतुष्ट व तुसड्या स्वभावाचे परावलंबी व परान्नपुष्ट होऊन गावाबाहेरच्या घाणेरड्या धर्मशाळांतून लोळत पडलेले असे नव्हते हे सिद्ध होते. आज सर्व हिंदुस्थानभर निर्जन गिरिकंदरांतून लहान मोठ्या गुंफा आणि लेणी आढळतात. ती एके काळी उद्योगी, शांत आणि सहृदय भिक्षूंनी गजबजलेली, आल्हादकारक वस्तीची ठिकाणे होती. ती लोकवस्तीच्या अशुद्ध वातावरणापासून जरी अलिप्त असली, तरी खालील मैदानात रहाणा-या जनसमूहाच्या शिक्षणार्थ व कल्याणार्थ ह्या भिक्षूंच्या अविश्रांत प्रयत्नांचे जे प्रवाह वहात असत, त्यांची ही ठिकाणे केवळ उगमस्थानेच असत.

बौद्धधर्माचे प्राचरक विरक्त आणि सहृदय असत, इतकेच नव्हे, तर त्यांचे प्रयत्न प्रवृत्तिपर असत. ह्या प्रचारकांचा शिरोमणी जो अशोक राजा त्याने तर अगदी भिक्षूप्रमाणेच निरंतर जनसेवेत आपले सर्व आयुष्य वेचले आणि आपल्या स्वत:च्या मुलांमुलींनाही भिक्षू केले. त्याने धर्ममहामात्रा नावाचा एक नवीनच अधिकारी नेमून त्याच्याकडून आपल्या विशाल साम्राज्याच्या शिवेवर राहणा-या जंगली लोकांचीही सुस्थिती आणि अभिवृद्धी व्हावी अशी तरतूद केली होती. त्याने आपल्याच नव्हे, तर आपल्या मांडलिकांच्या व आपल्या शेजारच्या राज्यातही मनुष्याकरिता व पशूंकरिता दवाखाने स्थापिले व अरण्यातून उपयुक्त औषधी वनस्पतींची व फळझाडांची लागवड सुरू केली. जागजागी तळी, विहिरी इत्यादी खणून व वाटेने सावलीसाठी झाडे लावून माणसांना व गुरांना सारखेच सुखविले.

विस्तार
ह्या वरील तीन लक्षणांनी युक्त हा धर्म होता म्हणून जुन्या काळात जेव्हा प्रवासाची साधने आतासारखी नव्हती, तरीही त्याचा इतका प्रसार झाला. अशोकाच्या वेळीच हा धर्म सर्व हिंदुस्थानभर पसरला, इतकेच नव्हे, तर बाहेर बॅक्ट्रिया व पार्थिया व आशियाच्या पश्चिम किना-यापर्यंत ह्याचे प्रचारक गेले. पूर्वेस सयाम, ब्रह्मदेश, ह्या देशांत दक्षिणेस सिलोनातही ह्याची स्थापना झाली. चीन व जपानकडे ह्याची माहिती झाली ती प्रथम आशियातील पश्चिम राष्ट्रात ह्या धर्माचा जो ख्रिस्ती शकाच्या आरंभी प्रसार झाला होता, त्यावरून झाली. त्यावरून चीन देशाच्या मिंगही (इ. स. ५८-७६) राजाने प्रथम हिंदुस्थानात १८ चिनी विद्यार्थ्यांना बुद्धधर्माची माहिती करून घेण्यासाठी पाठविले. ते हिमालयाला वळसा घालून वायव्येकडून ह्या देशात आले व येथील बरेच धर्मग्रंथ व दोघे भिक्षू त्यांनी आपल्या बरोबर चिनात गेले. त्या लोकांकडून बौद्धधर्माचा चीन देशात झपाट्याने प्रसार झाला व लवकरच जपान, कोरिया, मंगोलिया, सौबिरिया व तिबेट वगैरे बहुतेक आशियाचे भाग ह्याने व्यापून टाकले.

पुढे हिंदुस्थानात ह्या धर्माला उतरती कळा लागून तो शेवटी बहुतेक नामशेष झाला, त्याची जी कारणे आहेत, त्यांपैकी त्या धर्माची वर सांगितलेली सहिष्णुता व सौम्यता हेही एक कारण आहे. मुसलमानांच्या स्वा-या व हिंदूंचा छळ ही कारणे आहेतच. प्रसिद्ध चिनी प्रवासी हिंदुस्थानात आला त्यावेळी देखील ज्या ज्या प्रांती ह्या धर्माला तेथील प्रबळ राजाचा आश्रय होता, तेथे बौद्ध धर्माइतकाच हिंदुधर्माचा जोर चालू होता, हे बुद्धधर्माच्या अपूर्व सौम्यपणाचेच फळ म्हणावयाचे. कान्यकुब्ज देशाचा प्रसिद्ध शिलादित्य राजा ज्याने इ. स. ६३४ साली एक मोठी धर्मपरिषद भरविली, तो बुद्धधर्माचा अनुयायी व मोठाच पुरस्कर्ता होता, तरी त्याच्या राजधानीत जसे १०० बौद्ध विहार होते, तशीच १०० ब्राह्मणधर्माची देवळेही होती. पुढे लवकरच कुमारिल भट्ट व शंकराचार्य ह्यांच्या चिथावणीने, बौद्धांचा राजाश्रय नाहीसा होऊन घोर जुलूम व छळ सुरू झाला. व शेवटी ह्या सात्विक व सौम्य धर्माने आपल्या मायदेशाला कायमचा रामराम ठोकला.

जीर्णोद्धार
आधुनिक निरपेक्ष ओघामुळे व विचारपद्धतीमुळे ह्या धर्माची खरी तत्त्वे व मोठी कामगिरी लोकांपुढे येऊन पाश्चात्य देशांत व आमचेकडेही ह्याविषयी बरीच सहानुभूती वाढू लागली आहे. ज्यांच्या पूर्वजांनी एकाद्या नवीन धर्मस्थापकावर धोंडे मारून त्याचा प्राण घ्यावा, त्यांनीच पुढे त्याचे भले मोठे सुंदर थडगे बांधण्यास पुढे यावे हा प्रकार सर्वत्रच आहे. परवा पेशावर येथे ज्या बुद्धाच्या अस्थी सापडल्या त्या ब्रह्मदेशात न पाठविता ह्याच देशात ठेवण्याविषयी व्हाइसरायसाहेबांना विनंती करण्याकरिता एक डेप्युटेशन गेले होते, तोही वरच्याचाच प्रकार. पण ह्यापेक्षा बौद्धधर्माच्या जीर्णोद्धाराची अधिक महत्त्वाची चिन्हे अलीकडे दिसू लागली आहेत. मद्रास येथील सरकारी कॉलेजातील प्रॉफेसर नरसू ह्यांनी बौद्धधर्मावर एक पुस्तक करून तेथे एक संघ स्थापन केला आहे आणि तो केवळ सुशिक्षित लोकांचाच नव्हे, तर तेथील बरीच पारिया वगैरे अस्पृश्य जातीची मंडळी ह्या समाजात आहेत. अद्यापि ह्या उद्धाराचे काम वरील सुशिक्षित व समजुतदार वर्गातच व तेही वाड्मयाच्याद्वारे बरेच व्हावयाला पाहिजे आहे. हल्ली प्रसिद्ध पाली पंडित व बुद्धधर्माचे तेजस्वी प्रचारक प्रो. धर्मानंद कोसंबी ह्यांच्या विद्वत्तेमुळे व परिश्रमामुले कलकत्ताव मुंबई ह्या दोन युनिव्हर्सिटींत तरी पाली भाषेचा शिरकाव झाला आह. ह्या बाबतीत बहुजनसमाजास सहज समजेल अशा सुलभ वाडंमयाचा जारीने प्रसार व्हावयाला पाहिजे. अशावेळी धर्मानंद हे तूर्त काही वर्षे अमेरिकेत रहाणार असल्यामुळे, त्यांच्या येथील कामात व्यत्यय आला आहे, तरी अमेरिकेतील हॉवर्ड युनिव्हर्सिटीत पाली भाषेतील महत्त्वाच्या व कठीण ग्रंथाचे भाषांतर करण्याच्या कामीच त्यांचा उपयोग होणार असल्यामुळे जीर्णोद्धाराचे काम चालू राहीलच. एकंदरीत आता जो बौद्धधर्माचा जीर्णोद्धार व्हावा अशी आमची इच्छा आहे, तो हल्ली इतरत्र प्रचलित असलेल्या त्या धर्माच्या विधिवैकल्यांचा, टिळाटोपीचा किंवा निर्जीव आचाराचा नव्हे, तर ज्या उदार तत्त्वाच्या योगे मागील काळी मनुष्यजातीची उन्नती झाली, त्यांचा आमच्यामध्ये पुन: उद्धार होऊन आमच्या धर्मसमजुतीस सर्वदेशीयता व आचरणाला अधिक उज्ज्वलता येवो इतकीच इच्छा आहे.

बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड

परीक्षेच्या घाईमुळे हे पत्र एकदोन आठवड्यांचे शिळे झाले आहे. तथापि मजकूर शांतीसंबंधाचा असल्याने इतकी घाई केली नाही म्हणून काही हरकत नाही.

दक्षिणारण्यातील नरमेध तर संपला. त्याची आता गत गोष्ट झाली. आपले सुमारे ९६ हजार कामास आले. पैकी सुमारे चौथाई तर यमाने जागच्या जागी वसूल केली. हा जो इतक्यांना मोक्ष मिळाला तोही काही फुकट नव्हे. तर मागे हळहळणा-यांना त्याबद्दल जवळजवळ ३ अब्जांचा खर्च आला आहे. प्रथिपक्षाचे काय काय नुकसान झाले ह्याचा अद्याप पत्ता नाही. भावी इतिहासकार रिकामपणई त्याचा हळूहळू छडा लावतील!

धर्मयुद्ध असो वा कसेही असो, युद्ध म्हणजे अनिष्ट. सतत विकास पावणा-या मानवी आयुष्यात सांग्रामिक कालाची आवश्यकता असेल. पण आवश्यकतेवरून त्याचा चांगुलपणा सिद्ध होत नाही. एके काळी मानवजातीस विद्या, कला, शास्त्र ह्यांपेक्षा युद्धाचीच प्रौढी विशेष वाटत होती. आणि हल्लीच्या काळी, स्पेन्सरसारख्या सात्विक ब्राह्मणांनी सांग्रामिक युगाहून औद्योगिक युग अधिक श्रेयस्कर व उन्नत आहे असे कितीही प्रस्थापिले तरी वरील प्रौढी अद्यापी व्हावी तितकी कमी झाली नाही. इतकेच नव्हे तर त्याच स्पेन्सरसाहेबांनी नुकताच आपला अगदी शेवटचा म्हणून जो ग्रंथ प्रसिद्ध केला आहे त्यात सुधारलेल्या जगात हल्ली ज्या अनार्यपणाच्या लाटा उसळत आहेत त्यांचे चांगले दिग्दर्शन केले आहे. पशुदशेतून मानवदशेचा विकास झाला आहे हे डार्विनचे मत कित्येक कोमल अंत:करणाच्या माणसांस पसंत नाही. तरी जोवर राष्ट्राराष्ट्रांतील वाद आम्हांस रक्तपाताशिवाय मिटविणे अशक्य दिसते तोवर आमच्या पूर्वज-पशूंचे अवशेष आमच्यात अद्यापि कायम आहेत हे कबूल करणे निदान समंजसपणाचे आहे.   
सुबोध पत्रिका, ता. २०-७-१९०२.

काही असो, दक्षिण खंडाला शोभणारे हे रणकंदन एकदाचे आटपले म्हणून ह्या उत्तर द्वीपात सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. आबालवृद्ध, स्त्रीपुरूष, सुधारक-उद्धारक ह्या सर्वांना अजुनी आनंदाचे उमाळे येत आहेत. ह्या लोकांची आनंद प्रदर्शित करण्याची त-हा काही अप्रतिमच! युद्ध चांगले की वाईट हे सांगणे फार सोपे आहे. पण ते संपल्यावर ह्यांनी जो आपला राष्ट्रीय उल्हास दाखविला-आणि तोही ऑक्सफर्डसारख्या पवित्र आणि शांत शही-तो पाहून परकीयाने त्यास बरा अगर वाईट म्हणणे फार जोखमीचे काम आहे! म्हणून प्रथम एकदोन दिवशी-विशेषत: रात्री येथे जो प्रकार घडला-नव्हे मला दिसला तो लिहीत आहे. वाचकांनीच आपापले तर्क जपून करावेत.

तहाची तार येथे रविवारी रात्री पोहोचली, म्हणून तेव्हा काही विशेष घडले नाही. दुसरे दिवशी सकाळी मी माझे खोलीत न्याहारीस बसलो असता आमची घरवाली हातात एक मोठी रंगीबेरंगी पताका घेऊन अवचित माझ्यापुढे उभी राहिली. तिच्या तोंडावर विजयश्री स्पष्ट दिसत होती. नंतर खालील छोटासा संवाद झाला:

मी - कायहो तुम्हा (बायकां) लाही आनंद होतो ना!
ती - हो! हो! हे काय विचारणे.
मी - राज्य मिळाले म्हमून की लढाई संपली म्हणून?
ती - दोन्ही रीतींनी.
मी - म्हणजे दुस-या रीतीनेही होतो म्हणावयाचा?
ती - तर हो काय! भाकरीवरदेखील कर बसविण्यापर्यत मजल आली तर लढाई एकदाची  
     संपली म्हणूनही आनंद का वाटू नये?
मी - तर मग ह्या निशाणीचे प्रयोजन काय?
ती - तो भाग वेगळा. ही निशाणी न लाविली तर संध्याकाळच्या आत माझ्या खिडक्यांना
     तावदाने राहणार नाहीत!
मी - काय म्हणता?
ती - तर काय! मॅफकिंगचा जेव्हा वेढा उठल्याची बातमी आली तेव्हा येथील रस्त्यातील
     पोरट्यांनी कोण कहर केला!
मी - एकूण ह्या निशाणीची अनेक कारणे आहेत एक, राज्य मिळाले म्हणून, दुसरे, लढाई
     संपली म्हणून, तिसरे, रस्त्यातील उनाड देशाभिमानास बुजगावणे म्हणून इ. शेवटी
     बाईने हासत घरावर निशाण लाविले.

नंतर मी दाराबाहेर येऊन पाहतो तो आळीतील प्रत्येक खिडकीतून युनिअनजॅक बाहेर पडत होता. हामरस्त्यावर तर जारीने तयारी चालली होती. दुकानदार, वखारीवाले आणि घरंदाज इत्यादी लोक आपापल्यापरी निरनिराळी जयचिन्हे उभारण्यात गुंतले होते. लहानसान पताका, मोठ बावटे, गुढ्या, तोरणे ह्यांचा थोड्याच वेळात मोठा गहजब उडाला. शहरातील मुख्य रस्त्यात तर रंगाची चंगळ झाली होती. दिवश जसजसा वर येऊ लागला तसतशी अधिक तयारी होऊन अधिक शोभा येऊ लागली. खटारेवाल्यांनी आपल्या खटा-यांवर व बगीवाल्यांनी घोड्यांच्या कानांवर आणि चाबकांच्या शेवटास निरनिराळ्या रंगांच्या फिती लाविल्या! लवकरच बायसिकल्सवरूनही झेंडे फडकू लागले. अखेरीस ही आनंदाची साथ गुलहौशी बायकांच्या कुत-यांपर्यंत पसरून त्यांचे गळे रंगले! अनुकरण आणि चढाओढ ह्यांमुळे हा प्रकार कोठवर वाढेल ह्याचा सुमार लागेना. तिस-या प्रहरी लहान-लहान मुले खांद्यावर पताका ठेवून, तोंडाने कथिलाची शिंगे फुंकून त्यांचा कर्कश आवाज काढीत रस्त्यातून भटकू लागली!

सांजावून किंचित कडोसा पडल्यावर देखावा बदलला. दुकानांवरून व घरांवरून ग्यासच्या चित्रविचित्र दिव्यांची रचना केली होती. त्या सर्वांनी आता पेट घेतला. कित्येक ठिकाणी जपानी कागदी कंदीलांची तोरणे रस्त्यावरून आडवी टांगली होती. काही कॉलेजांवरून कार्तिकाची विशेष शोभा दिसत होती. सार्वजनिक आनंद प्रदर्शनाचे ह्या लोकांचे मुख्य साधन बॉन फायर्स म्हणजे होळ्या. गावात ह्या निरनिराळ्या ठिकाणी ८-१० रचिल्या होत्या. मोडकी पेटारे, डांबर ठेवण्याची पिंपे आणि इतर सटरफटर ह्यांनी काही होळ्या २५ फुटांपर्यंत उंच गेल्या होत्या. ह्यांचाही आता एकच भडका उडाला. इकडील गरीब व खालच्या वर्गाची एरवी देखील सायंकाळी फुरसतीच्या वेळची मुख्य करमणूक म्हणजे गावातील मुख्य रस्त्यातून इकडे तिकडे मनसोक्त भटकणे. त्यात तरूण मुलींचा भरणा विशेष! आज तर ह्या गर्दीला काही निराळाच रंग आला होता. होळ्या पेटल्यावर रस्त्यात अगदी खेचाखेची झाली.

रात्रीचा पूर्ण अमल बसल्यावर ह्या देखाव्याचे तिसरे आणि भलतेच रूपांतर झाले! सकाळी पाडवा, संध्याकाळी दिपवाली तर रात्रीच्या काळोखात ह्या उत्सवाने आमच्या शिमग्यासही लाजविले! ह्या शिमग्यातील मुख्य पार्ट युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी बजाविला!! संध्याकाळनंतर विद्यार्थी युनिव्हर्सिटीचा झगा आणि टोपीशिवाय खोलीबाहेर कोठेही दिसल्यास त्यास दंड, ११ वाजल्यावर बाहेर दिसल्यास दंड, १२ वाजल्यावर दिसल्यास जबर दंड, इ. ह्या युनिव्हर्सिटीचे नेहमीचे अगदी कडक कायदे आहेत. पण मॅफकिंगच्या रात्रीच्या अनुभवावरून आज हे सर्व कायदे तहकूब करण्यात आले होते. मग काय विचारता! दहादहा बाराबारा रंगेल गडी हातात हात घालून लांब रांगा बनवून गर्दीतून अर्धे उघडे बोडके हैदोस करीत निघत. गावठी तरूण मुलींच्याही अशाच रांगा चालल्या! ह्या भिन्न जातींच्या रांगा जेव्हा समोरासमोर भिडत तेव्हा रांगांचे वर्तुळ बनत असे. मग क्षणमात्र “चुंबति कामपि श्लिष्यति कामपि कामपि रमयति रामामं” ही अस्सल गोकुळी रासक्रीडा होई! अशा प्रसंगी सभ्य मुली बाहेर पडत नाहीत. पडल्या तर त्यांचा सभ्यापणा कायम राहत नाही. थोडा वेळ त्याचा भंग झाला म्हणून त्याचे त्यांस वाईट वाटत नाही. वाटले तरी कोणी विचारीत नाही. अलीकडे आमच्या शिमग्यासंबंधी निदान सुधारक पत्रातून तरी थोडी टीका होते. पण तशी देखील इकडे काही दिसली नाही. कारण बोलून चालून हा तात्पुरता पोरकटपणा, असा येते सर्वानुमते ठराव झालासे दिसते. काही असो, नवख्यास एकंदरीत हा प्रकार पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

डोळ्यांचा भडका जसा कमी होऊ लागला तसे आजूबाजूचे फालतूक अडगळीचे सामान आत येऊन पडू लागले! एके ठिकाणी तर एका मोडक्या घरावर हल्ला झाल्यामुळे, पोलीसास मध्यस्थी करावी लागील! अशा प्रकारच्या आनंदाच्या वेळी ऑक्सफर्डमध्ये दुसरा एक विशेष मौजेचा प्रकार दृष्टीस पडतो. तो असा, विद्यार्थ्यांच्या टोळ्या रस्त्यातून हिंडत असता गावातील टोळ्यांशी काही तरी कुरापत काढून मरामारी करतात. ह्या तंट्यास येथे ‘टाऊनीज एँड गाऊनीज प्यड्स’ म्हणजे झगेकरी व गावकरी ह्यांचे तंटे असे म्हणतात. हीच चाल फार पुरातन काळापासून आहे. पूर्वी खरोखरीचे मोठे दंगे होत असत. ह्या वेळीही एका कॉलेजच्या दारात. सुमारे तासभर दंगामस्ती झाली. ह्याचे प्रथम मला फार आश्चर्य वाटून इकड पोलीस का दुर्लक्ष करतात ह्याबद्दल मी एका शिपायास विचारिले. येथील पोलीस म्हणजे धिप्पाड, कर्तव्यदक्ष, शांत आणि अतिसभ्य लोक असतात. त्यांपैकीच एक म्हणाला..... “अशावेळी आम्ही जास्त सवलत देतो. आम्हीच जर चिडलो तर सारा गाव खवळेल. हे दंगे विशेष विकोपास पेटले तरच आम्ही शांतपणे मिटवितो” त्याने असेही हासत हासत सांगितले-“भांडण मिटविताना मला स्वत:लाच तीनदा मार खावा लागला!” ह्यावरून हा शेंदाड शिपाई होता असे नव्हे. तर चिडखोरपणा व अरेरावी ह्या गुणांची पोलिसास आवश्यकता नाही, इतकेच त्याने फार गोडपणे सुचविले!

असो, ह्या प्रकारे पहिल्या एकदोन रात्री येथे अनेक तमाशे दिसले. पण हीच तमासगीर विद्यार्थी मंडळी दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे म्युझिअम, लायब्र-या लॅबोरेटरी वगैरे ठिकाणीं आपापल्या व्यासंगांत गुंग झालेली दिसली

बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट !

लीथस् कॉटेजच्या वन्य कुटिकेत आमचे जे पुढील पंधरा दिवस अति सुखाचे गेले त्याची गोड सूचना, गुरूपत्नीने वर सांगितल्याप्रमाणे प्रथमदर्शनी दुरूनच जे स्वागत केले त्यात मिळाली होती.

इंग्लिश सरोवर-प्रांत हे एक सा-या युरोपात पाहण्यासारखे स्थळ आहे आणि त्यात डरवेंटवॉटर हे सुंदर सरोवर व त्याच्या काठचे बॉरोडेल नावाचे खोरे ही तर एकाद्याला अगदी वेड लावून टाकतात. म्हणूनच मागे ह्या ठिकाणी मोठमोठे राष्ट्रीय कवी व लेखक संसार अगदी विसरून भृगासारखे गुंगत राहिले, व आता तर युरोप आणि अमेरिकेहूनही रसिकांच्या झुंडीच्या झुंडी येथे येतात! प्रख्यात सौंदर्यवादी जॉन रस्किन हा जेव्हा अगदी लहान होता तेव्हा दाईने त्यास एकदा ह्या सरोवराच्या काठी फ्रायर्स क्रॅग नावाच्या लहानशा खडकावर आणिले, त्यावेळी त्या मुलाच्या अति कोवळ्या व ग्रहणशील मनावर निसर्गाने येथे असा कायमचा छाप मारिला की, ही त्याची प्रथम भेट रस्किन मरेतोपर्यंत वारंवार उत्कंठेने आठवीत असे. आता ह्या खडकावरील झाडीत रस्किनच्या चहात्यांनी वरील भेटीच्या स्मारकार्थ एक सुंदर शिलालेख रोविला आहे !

आमच्या गुरूची कुटिका बॉरोडेल दरीच्या तोंडाशी, डरवेंट नदीच्याकाठी, डोंगराच्या बगलेत जेथून सर्व सरोवर नजरेत चांगले भरेल अशा नाक्यावर उभी आहे. त्यामुळे येता जाता, उठता बसता, कार्य करता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरीदेखील हो! सृष्टीचे प्रसन्न मुख आम्हांस सतत दिसत असे. जेवणाच्या पंगतीत बसलो असता एकाएकी दूर स्किडॉच्या शिखरावर सूर्यकिरणाची अपूर्व शोभा दिसे, दिवाणखान्यात क्रीडेत गुंगलो असता मध्येच सरोवरावर मेघधारा नाचू लागत तिकडे लक्ष जाई, खोलीत वाचीत बसलो असता भिंतीखालच्या नदीशी वायू अकस्मात धिंगाणा घाली, आणि पाहता पाहता गुलाम दरीतून शीळ घालीत पार निसटून जाई! ह्या प्रकारे सृष्टीबाला आमच्याशी अहोरात्र सलगी करी पण ती मोठ्याची कन्या म्हणून तिच्या प्रत्येक चेष्टेचे आम्हा सर्वांना उलट मोठे कौतुकच वाटे!

एके दिवशी संध्याकाळी जेवण आटोपल्यावर मी एका समानशील सोबत्याबरोबर बॉरोडेल दरीत शतपावलीस निघालो. अहा! ही शतपावली कधी तरी विसरणे शक्य आहे काय! ह्या डोंगरातील सडकही रूंद, प्रशस्त आणि धुतल्यासारखी स्वच्छ होती. दोहों बाजूस हजार हजार फुटांचे उंचवटे क्वचित अगदी अंगाला येऊन भिडत, क्वचित पुन्हा मागे हटत, त्यांवरून नाना जातींची झाडे पालवली होती, फुले फुलली होती, लता लोंबत होत्या, लोहाळे लगटले होते, भारतीय देखाव्यांची प्रमुख लक्षणे जी रंगीबेरंगी शोभा आणि परिमळाचा दर्प ती मात्र येथे नव्हती, तथापि सौंदर्यात उणीव भासत नव्हतीच. उजवीकडचा कडा सरळ तुटला होता. डावीकडे डरवेंट नदी खडकातून उतरत असता आपल्याशीच मंद स्वरात मंजुळ ओव्या गात होती. त्या स्वरास सृष्टि—राग म्हणतात असे माझ्या मित्राने सांगितले.

चहूकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. शांतीचे साम्राज्य जणू डोळ्यांनी निरखू लागलो. सुधारणेची कटके तिने येथून बारा कोस पळविली होती. सुधारणा, उद्धारणा वगैरे विचारांचा गवगवाही बंद पडला. बाह्य शांतीमुळे अंतरातील खोल शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. ९|| वाजले होते तरी असा गोड संधिप्रकाश पडला होता की, वाचता सहज यावे. समोर कॅसल क्रॅगच्या निमुळत्या मनो-यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. आम्ही दोघे संगतीने चललो होतो, तरी बोलक नव्हतो. स्वतः कौतुक करण्याचीही वेळ मागेच टळून गेली होती, मग संवादाला जागा कुठे राहिली! जसजसे पुढे जावे तसतशी दरी आकसू लागली. नकळतच सृष्टीने आम्हांला शेवटी अगदी अंतःपुरात नेले! तेथे जिवलग जनांचीही स्मृती उरली नाही. निकट विषयांचेदेखील भान उडाले. लौकिकातून नाहीसेच झालो!

असा कोण जादूवाला ह्या भरलेल्या अंतःपुरात होता की, ज्याने आमची अशी पाहता पाहता पराधीन अवस्था करून सोडली! वरती जो एकदा लय लागला तो खाली करण्याची काही शक्ती उरली नाही.

आनंद होत होता काय आम्हांला?
सांगवत नाही. काही वेळापूर्वी मात्र झाला होता खरा.
आम्ही काही पहात होतो काय?
नव्हतो! दिसत होते पण काहीतरी!
मागितले का काही?
छे हो! काय मागावयाचे?
जिवाला कसे होत होते?
मधूनमधून सुस्कारे बाहेर पडत होते!
ते का म्हणून?

कोणी सांगावे! काहीतरी आतून बाहेर निघत होते व काही बाहेरून आत शिरत होते-छे, मी काहीतरी वेड्यासारखे वर्णन करीत आहे.
एकूण हा प्रकार काय? आणि ते कोण?
“prayer is the burthen a sigh,
The falling of a tear,
The upward glancing of an eye,
When none but God is near.”
-(Montgomery)
(मुखी श्वास, आसवे गाळी | नेंत्री वरतीच न्याहाळी |
अशा या प्रार्थनेच्या काळी | जवळी तोचि एकला ||१||)

कवीने हे वरील उद्गार कोणत्या वेळी काढले असतील ते असोत. मला तर आता असे कळून चुकले आहे की, वरील जो प्रकार घडला ती माझी प्रार्थना होती. आणि परमेश्वरावाचून जवळ कोणी नव्हते. एकूण प्रार्थनेचे काम इतके साधे व सोपे आहे काय? होय. कार्ळाइलही तेच सांगत आहे.

“Prayer is and always remains a native and deepest impulse of the soul…On the whole, silence* is the one safe form of prayer known to me in this poor, sordid era-though there are ejaculatory words too, which occasionally rise on one,with a felt propriety and variety.”

*ह्याचे भाषांतर तुकारामाच्या विचारात असे आले आहे:-
‘करावी ते पूजा मनेची उत्तम| लौकिकाचे काम काय तेथे’ ||१||

देवी! अशी प्रार्थना करावयाला व ही भेट घ्यावयाला सरोवर प्रांतापर्यंत येण्याचीच जरूरी आहे काय? नाही. जेथे कसली उपाधी नाही, अशा कोठल्याही उघड्या जागेत आणि मोकळ्या हवेतही उपासना घडण्यासारखी आहे. माणसांच्या गर्दीतही देवा तू भेटतोस. नाही कसे म्हणू! घरी आईची माया, बहिणीची प्रीती, पत्नीचा अनुराग, पुत्राचे वात्सल्य, समाजात शेजा-याची सहानुभूती, मित्रांचा स्नेह, राष्ट्रात देशभक्तांची कळकळ व संतांचा अनुग्रह आणि शेवटी जगतात महात्म्यांची निरपेक्ष अनुकंपा इत्यादी दर्शनेही तुझ्याशिवाय इतर कोणाची असू शकतील? जनात तुझा असा साक्षात्कार घडतो खरा, पण तो किती विरळा. उलटपक्षी किती कठीण अनुभव येतो! पण एथले तुझे रूप कसे अबाधित आणि अखंड आहे! हे वरचे आकाशाचे छत कधी फाटेल काय! हा खालचा सरोवराचा आरसा कधी फुटेल किंवा मळेल काय! ह्या पाखरांचे गळे कधी बसतील काय! हे पर्वताचे तट, हा वा-याचा पंखा, वृक्ष, वल्ली, दळ, पाषाण, पाणी, आकाशातील मेघ ह्यांवरूनही सर्वत्र ईश्वरा ‘तुझी कुशलधाम नामावली’ कशी सुवाच्य रेखाटली आहे! लहान बालके देखील ती वाचून आनंद पावतात! मग आम्ही का असे वारंवार विन्मुख व्हावे! हे कल्याणनिधान, आम्ही स्वत:भोवती जो क्षुद्र चिंतेचा गुंता निरंतर गोवीत असतो तो तूच करूणेने उकल, आणि आतासारखेच वेळोवेळी आपल्याकडे कृपाहस्ताने आम्हांला ओढून घे. आमच्या इच्छेनेच तुजकडे येण्याची आमची शक्ती नव्हे!

वगैरे वगैरे प्रार्थना देव भेटून गेल्यावर, उघडपणे करीत आम्ही परत कुटिकेंत आलों.

बेन लोमंड शिखरावरील समाधि

ऑगस्ट महिन्यांत एके दिवशीं सकाळीं लगबगीनें न्याहारी आटोपून, लोमंड सरोवराच्या काठी हार्बेट बंदरावर आगबोटीची वाट पहात मी उभा होतो. जिच्या मुद्रेत सायंकाळचे प्रसंगी एक प्रकारच्या आध्यात्मिक औदासिन्याची आणि चिंतनगांभीर्याची शोभा दिसत असे ती ही ‘स्कॉच सरोवराची राणी’ आज सकाळी आपल्या सर्व परिवारासह अत्यंत सुप्रसन्न दिसत होती. आज दिवस इतका स्वच्छ व सोज्वळ होता की, ह्या उन्हाळ्यातला हा अगदी पहिल्या प्रतीचा असे लोक म्हणू लागले. पैलतीरावर ‘बेनलोमंड’ प्रवताचे निमुळते शिखर इतरांहून उंच आकाशात गेले होते. येथून सुमारे ५ मैलांवर पर्वताचे पायथ्याशी रॉबर्टनान नावाच्या एका कोप-यातील बंदरावर मी एकटाच उतरलो आणि हळूहळू चढण चढू लागली. येथे एकांत म्हणजे अगदी पूर्ण प्रतीचा होता. जिवलग माणसे व देशबांधव हजारो कोसांवर, एतद्देशीय मित्र, ओळखीचेही शेकडो कोस दूर, आसमंतात माणसांची कोठेही चाहूल दिसेना, प्रदेश अनोळखीचा, वाट गैरमाहितीचा, इतके असूनही मी अपरिचित स्थळी आहे असे वाटेच ना. जंगली हिंस्त्र पशूंची तर गोष्ट राहोच, पण साप, विचूं इत्यादी क्षुद्र किड्यांची येथे वार्ताही नाही. फार तर काय पायात काटाही मोडण्याची भीती नाही, अशी येथील डोंगर व राने अगदीच माणसाळून गेली आहेत. एकदोन शतकांपूर्वी ज्या प्रसिद्ध व बाणेदार रॉबरॉय रामोशाने हा सारा प्रदेश दणाणून टाकला होता त्याचीच गुहा व कबर पाहण्यास आता कॉलेजातील तरूण मुली बायसिकलवरून शेजारच्या पहाडात एकट्याच हिंडत आहेत! असो, ह्या प्रकारे ह्या स्थळाचा आता उग्रपणा जरी सर्वस्वी नाहीसा झाला आहे तरी येथील एकांतवासाला व जंगली शोभेला अद्याप तिळमात्र बाध आलेला नाही.

मी रान तुडवीत वरवर चाललो. एक टेकडीच्या माथ्यावर जावे तो अवचित पुढे दुसरी टेकडी दत्त म्हणून उभी राही. तरी चढण्याचा कंटाळा येईना की थकवा वाटेना. भोवताली प्रदेश अगदी उघडा, झाड ना झुडूप, पायाखाली मात्र हिरवेगार गवताचे दाट आणि दमट हांतरूण हांतरले होते. नजरेत कोठे पशू येईना की पाखरूही येईना. केव्हातरी एकाद्या दगडाच्या मागे रवंथ करीत पडलेले एकादे स्कॉच मेंढरू दिसे. पण ह्या सत्त्वशून्य प्राण्याच्या अशा क्वचित दर्शनामुळे माझ्या एकांतात म्हणण्यासारखा व्यत्यय येत नव्हता. सहज चुकून मागे नजर गेल्यास, खाली लांबवर पसरलेला अप्रतिम देखावा दिसे. २५ मैल लांब त्रिकोणाकृती लॉखलोमंड सरोवर अगदी क्लाईड नदीला जाऊन भिडले होते; जणू एक भले मोठे पिंपळाचे पानच कोठूनतरी तुटून ह्या विस्तीर्ण प्रदेशात पडले आहे! पण ते पाहूनही माझ्या आत्मचिंतनाचा भंग होईना की ऊर्ध्वगतीत खंड पडेना.

‘आत्मैवात्मनो बंधु:’ ही वाणी मला आजच्या इतकी पूर्वी कधीच कळली नव्हती; आपल्या खोल कपाटात अनुभव आणि अनुताप, ज्ञान आणि दर्शन बोध आणि प्रेरणा, इ. एक का दोन अनेक त-हेचे दैवी भांडार भरले असता आम्ही एकमेकांपुढे आपले दैन्य आणि दारिद्र्य किती तरी दाखवितो. भोवतालच्या वनस्पती-पायाखालचे गवतही नाही का आपल्या बळावर वाढत! मग आम्हीच का अशी स्वत:ची हेळसांड आणि पुष्कळदा असा दुरूपयोगही करतो? मदत मागावयाची ती दुस-याला का? ज्ञान धुंडावयाचे ते बाहेर का? पुस्तकाचे प्रामाण्य, माणसाचे माहात्म्य, मातीधोंड्याची आवश्यकता, वगैरे वगैरे कोण हे समजुतीचे व आग्रहाचे प्रकार आणि अशा हट्टाने किती डोईफोड! हा जो आमचा असा छळ होतो तो कोणी कोपलेला देव करीत नाही किंवा देवाचा कोणी प्रतिस्पर्धी सैतानही करीत नाही. तर आम्हीच आमच्या स्वत:चे न ऐकता असे आत्मशत्रू बनतो. लाज आणि संतोष, शिक्षा आणि शिफारस, बंधन आणि मोक्ष ह्या सर्व बाबतीत आमचे आम्हीच कारण आणि याला साक्षही स्वत:चीच, अशा ह्या आत्मसंभाषणात मी गुंतलो होतो. मजबरोबर जणू कोणी तरी पोक्त माणूस चालले आहे. आणि मी जर इकडे तिकडे पाहीन अगर मध्येच थांबेन तर ह्या माणसांचा जणू मोठा उपमर्द होईल अशा काही भावनेमुळे मी आजूबाजूस वाजवीपेक्षा फारसे लक्ष न पोहोचविता सारखा सरळ चढत होतो. अखेरीस अशा नादातच बनलोमंडच्या माथ्यावरील सर्वात उंच टोकावर मी आलो.

येथे दोन तरूण विद्यार्थी भेटले. आश्चर्याचा पहिला झटका निघाल्यावर, व अशा परक्या स्थळी अशा तीन परक्यांचे जे साहजिक स्वागत व संभाषण व्हावयाचे ते झाल्यावर ते दोघेही डोंगर उतरून दरीत दिसेनासे झाले. मी मागे माझ्याच समागमात राहिलो. बेन नेव्हीसचे शिखर खेरीज करून, सर्व ग्रेटब्रिटन देशातील अत्यंत उंच स्थानी एका शिळेवर मी आपले आसन मांडले. क्षुद्र पण क्षमय् गर्वाची थोडी झुळूक वाहिल्यावर, लगेच आतबाहेर निवांत झाले.

बारा वाजले होते, वारा वाहत नव्हता, थंडी वाजत नव्हती, उष्मा वाटत नव्हता, बाजूस शेदोनशे कदम कोरडी आणि सपाट जमीन होती. शेवटी एकदम कडे तुटले होते. वर पसरलेले आकाशाचे अवीट घुमट खाली भोवतालच्या विस्तीर्ण क्षितिजवलयावर टेकले होते. त्यावर मध्यंतरी ढगाचा कोठेही डाग लागला नव्हता. दिनमणी मधोमध तळपत होता. त्या प्रकाशात चाळीस मैलांवरचा ग्लासनो शहरातला धूर आणि धुरळा दिसत होता. (समुद्रसपाटीपासून हे स्थान ३१९२ फूट उंच आहे.) पर्वत, नद्या, सरोवरे, बेटे, माळराने वगैरे आसमंतातील सुमारे १०० मैलपर्यंतची कारागिरी चर्मचक्षूपुढे दिसू लागली. अनंत स्थळ आणि अनंत काल हे दोन भिन्नजातीय गोल परस्परांच्या पोकळीत तरंगत आहेत, असा देखावा चित्तचक्षूला दिसू लागला. खाली लोमंड सरोवरावरून एकादी आगबोट केव्हातरी दुरून तरंगत जात असताना लहानशा हंसीसारखी दिसे. पुढे पसरलेल्या एवढ्या अफाट चित्रपटात त्या हंसीशिवाय चैतन्याची इतर खूण म्हणून दिसेना! तसेच चित्तचक्षूपुढे पसरलेल्या स्मृतिपटात केव्हातरी एकादे व्यक्तिचरित्रातील पापपुण्य अगर मानवी इतिहासातले सुखदु:ख ह्याची नुसती ओझरती आठवण होऊन जाई, ह्यापेक्षा जास्त येथेही हालचाल घडेना, हळूहळू हे दोन्ही बाहेरचे व्यापार बंद पडू लागले. आत काय व्यापार चालला होता ते कोण लिहू शकेल! काही काळाने सर्वच सामसूम झाले !!

दोन वाजता ही समाधी आटोपली. नंतर मी वनातून परत जनाकडे हळूहळू उतरू लागलो. मोठ्यांची एकदोन वाक्ये आठवली आहेत ती येथे देतो :

I had heards of Thee by hearsay;
But now my eye seeth Thee,
Book of job XLII Old Test

कां जे ध्यौर्लोक आणि पाताळ | अथवा पृथिवी आणि अंतराळ| अथवा वशदिशा समाकुळ| दिशाचक्र ||१५|| हे आघवेची तुवां एके| भरले देखत आहे कौतुके| परी गगनाही संकट भयानके| आल्पविजे जेवि ||१६|| नातरी अद्भुत रसाचीया कल्लोळी| जाहाली चवदाही भुवनासि कडियाळी| तैसे आश्चर्यचि मग मी आकळी| काय एक ||१७|| नावरे व्याप्ति हे असाधारण | न साहवे रूपाचे उग्रपण | सुख दूरी गेले तरी प्राण |विपाये धरी जग ||१८||

ज्ञानेश्वरी गीता अ. ११ श्लोक २०.

वरील पत्रात मी माझ्या निरनिराळ्या खासगी अनुभवास ‘प्रार्थना’ ‘भेट’ ‘समाधी’ अशी मोठी नावे दिली आहेत. त्यावरून वाचकास ही आत्मप्रौढी आहे असे वाटेल आणि केलेले वर्णन अतिशयोक्तीचे आहे असा आरोप येईल. पण खरा प्रकार तसा नाही. वरील प्रसंगी कोणाही य:कश्चित् मनुष्याची वरील अवस्था होणे साहजिक आहे. फार तर काय, खालील प्राण्यातही जेथे जेथे चैतन्याचा अधिक विकास झालेला असतो तेथे तेथे वरील सौंदर्यदर्शनाचे प्रसंगी वरील समाधीचा म्हणजे चैतन्याच्या एकीकरणाचा प्रकार सहज घडतो. मेघास पाहून मोर नाचून नाचून तटस्थ होतो. वसंतगामी कोकिळा गाऊन गाऊन स्तब्ध बसते. “सर्प भुलोनि गुंतला नादा | गारूडिये फांदा घातलासे |” हे तुकाराम सांगतात. असा जर सर्वत्र सृष्टीनियम आहे तर त्याला माझेच मन का अपवाद असेल !

आता, वरील अनुभव सर्वसाधारण मानाने सर्वच माणसांस होण्यासारखा असून, किंबहुना होत असूनही जर काहीजण तिकडे तादृश लक्ष पुरवीत नसतील अगर लक्ष पुरवूनही त्या त्या अनुभवांचा तादृश्य अर्थ करीत नसतील तर ती त्यांची खुशी. पण ह्या बाहेरच्या खुशीच्या भिन्नत्वामुळे आतील स्वाभाविक अनुभवास बाध येत नाही किंवा भिन्नत्वही येत नाही. अनुभव तो प्रकृतीच्या आणि प्रसंगाच्या मानाने सर्वत्र सारखाच यावयाचा. त्या अनुभवाचा झटका केव्हा केव्हा इतका जबर बसतो की, काव्य, कादंबरी, साहित्य ही सर्व बापुडी त्याच्या यथार्थ वर्णनाचे कामी केवळ पंगू ठरतात मग अतिशयोक्तीची गोष्ट कशाला !

बर्टन खेड्यांतील शाळा कशी दिसली !

वुडसाइड रे. कार्लाईल
(सुबोधपत्रिका, ता. २४-०८-१९०२.)

इंग्लंडच्या दक्षिण किना-यावर ब्रिडपोर्ट नावाचा एक टुमदार गाव आहे. त्याचे पूर्वेस तीन मैलांवर बर्टन नावाचे एक सुमारे ७०० वस्तीचे चिमुकले खेडे आहे. खेड्याबाहेर गावकुशीत एका जुन्या पण स्वच्छ इमारतीत मी एक शाळा पाहिली. तिच्या भोवताली निर्मळ, साधे पण विस्तीर्ण पटांगण होते. येथून एका हाकेवर टेकडीच्या पलीकडे समुद्र पसरला होता. शाळेत शिरताना एक लहानशी देवडी लागली. तीत मुलांच्या टोप्या ठेवण्यास भिंतीत खुंट्या ठोकल्या होत्या. खाली नंबर लावले होते. प्रत्येकाचा नंबर ठरलेला होता. शाळेची मधली मोठी मुख्य खोली ६० फूट लांब व २० फूट रूंद होती. तीत मुलांच्या वयाच्या मानाने केलेले दोन मोठे वर्ग बसले होते. मुलांची संख्या ७१ व मुलींची ६७ होती. ती सर्व मिळूनच बसल्यामुळे मुलगे व मुली अशा फाजील जातिभेदास ह्या शाळेत कोठे जागा राहिली नव्हती. माणसांच्या निरनिराळ्या जातिभेदास तर ह्या बेटातूनच हद्दपार केले आहे, हे येथे नव्याने सांगावयास नकोच.

शाळेत गेल्यावर प्रथम भिंतीवर ख्रिस्ताची मोठमोठी चित्रे अगदी लहान मुलांसही कळतील अशी दिसली. समोरच्या तसबिरीत तो काही लहान मुलांस आपल्या जवळ घेत होता. खाली हे त्याचेच वाक्य होते. ‘लहानग्यास मजकडे येऊ द्या. स्वर्गीय राज्य अशांचेच आहे.’ भोवताली त्याच्या इतर परोपकाराचे प्रदर्शन केले होते. शिवाय भिंतीवर चंद्र, चौक, कोन, गोल इ. अनेक रंगांच्या निरनिराळ्या आकृती जागोजाग लावल्या होत्या. मधून खंडाचे व देशाचे नकाशे कायमचे सोडले होते. शिवाय काही प्रसिद्ध पुरूषांचे व स्थळांचे लहान मोठे फोटो टांगले होते.

हेडमास्तर हुषार, दक्ष व अत्यंत आदरशील दिसले. त्यांची पत्नीही शाळेत शिकवीत होती. व दुसरी एक मदतनीस शिक्षकीण होती. वहिवाटीप्रमाणे मुलांच्या सात इयत्ता होत्या, पण शिक्षकांच्या अनुभवाप्रमाणे, शिक्षणाच्या सोयीप्रमाणे व मुलांच्या हुषारीप्रमाणे मुलांचे खरे वर्ग चारच होते. वर्षातून एकदोनदा शाळेत येणा-या उंटावरील शहाण्या इन्स्पेक्टरांची मास्तरांच्या मागे कोरडी पिरपिर फारशी दिसली नाही. त्यास व्यक्तिस्वातंत्र्य बरेच आहे.

६ व्या अगर ७ व्या वर्षी मुलांचा शाळेतील नियमित अभ्यासक्रम सुरू होतो. त्याच्यापूर्वीही काही अर्भके शाळेत खेळावयास येतात. गरीबांची मुले १५ व्या वर्षी शाळेतून बाहेर काम पाहण्यास जातात. शाळा खेड्यातील असल्यामुळे मुलामुलींच्या शिक्षणात काही फरक दिसला नाही. मुलांपेक्षा मुली मोठ्या दिसल्या. कारण मुलास आपला धंदा शिकण्यास लवकर शाळेतून सुटण्याची घाई असते. शाळेतून बाहेर पडल्यावर ५-६ वर्षांत कोणता तरी विशेष धंदा शिकून स्वत:चा निर्वाह साधावा लागतो. मुलीस तितकी घाई नसते. शाळा सकाळी ९ पासून १२ पर्यंत व दुपारी २ ते ५ पर्यंत उघडी असते. दररोज २ प्रमाणे वर्षातून निदान प्रत्येक मुलाच्या ४०० तरी हजि-या असल्या पाहिजेत.

बाजूच्या एका खोलीत लहान मुलांचा वर्ग अगर बिनयत्ता होती. ह्यांच्या स्लेटीवर खिळ्याने कायमच्या आडव्या-उभ्या रेघा मारल्या होत्या. अक्षरे व आकडे लिहावयाचे ते प्रत्येक चौकात एक असे लिहीत. त्यामुळे लहानपणापासूनच प्रमाणशीर, व्यवस्थेने व रांगेने लिहिण्याची सवय लागे. ह्याचा परिणामही मला लवकरच दिसला. काही लेखी परीक्षेच्या उत्तरांचे कागद मी पाहिले. कागदाचे छापलेले व आखलेले ठरीव नमुने होते. उत्तरे इतक्या व्यवस्थेशीर रीतीने लिहिली होती की परीक्षेच्या घाईत ती लिहिली असावीत हे संभवनीय वाटेना. पण ती तशी लिहिली होती ह्यात शंका नाही. कोठेही डाग अगर ठिपका दिसला नाही. तीन चार वर्षांनी तीन अर्भके लाकडाच्या निरनिराळ्या आकृतींच्या तुकड्यांनी घरे बांधून एका बाजूस खेळत होती.

एका मोठ्या कपाटात शाळेची म्युझिअम होती, ती अशी: वरच्या खान्यात साबण तयार करण्याची सामग्री, क्षार, तेले वगैरे व निरनिराळे साबणांचे मासले, खालच्या खान्यात दगडी कोळसा व इतर उद्भिजे, दुस-या बाजूस साखरेची सामग्री, उसाचे कांडे, मक्याचे कणीस इ. पासून तयार झालेल्या साखरेपर्यंत रूपांतरे, त्याच्या खाली रेशमी किड्यांच्या वेष्टनापासून तो तयार केलेल्या सुंदर लडीपर्यंत रूपांतरे, दुस-या बाजूस शेजारच्या कॉगडन डोंगरावर सापडलेले जुन्या रोमन लोकांचे दात, हाडे, थडग्यातील भांडी, हत्यारे वगैरे; खालच्य खणात धान्ये, बीजे आणि कापसापासून तो कापडापर्यंत गिरणीतील रूपांतरे, दुसरीकडे भूमितीचे ज्ञान करून देण्यास निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे ठोकलळे ठेविले होते. एका तावदानी पेटीत शिसपेन्सिलीचे पर्याय व दुसरीत पोलाद व तांब्याच्या पट्टीपासून तो टाकाच्या टोकापर्यंत कृती दाखविली होती. एका बाजूस चित्रांचे काही कित्ते ठेविले होते. त्यांत खेड्यातील दोंदील पाटीलबुवा व दरबारातील रणधीर सेनानी ह्यांचे तारतम्यदर्शक हावभाव हुबेहुब पण साध्या रेघांनी दाखविले होते. काही निरनिराळ्या घाटांचे गोंडस खोजे व मातीची इतर भांडीही होती. कपाटाखाली झाडाचे एक खोड कित्येक सहस्त्र वर्षापूर्वी भूगर्भामध्ये दडपून जाऊन साक्षात दगड बनलेले पाहण्यासाठी ठेविले होते, इ. सामग्रीच्या साहाय्याने मुलांच्या कुवतीप्रमाणे खालील विषयांवर गोष्टीच्या रूपाने सप्रयोग व साक्षात पदार्थ दाखवून मुलांचे लक्ष वेधले जाई:

 

 बिनयत्ता  १,२,३ री इयत्ता  ४,५,६,७ वी इयत्ता
ऍपल फळ,
सूर्यकमळ,
मध, मधमाशी,
साबणस चामडे,
खेड्यातील बाग,
ससा, पोस्टशिपाई,
ऑफिस, दीपस्तंभ,
बर्फ, पाऊस
एंजिन, सेफ्टी लँप,
कापड, घड्याळ,
छत्री, बेडूक,
काच, भुई,
झाडाचे भाग,
आगकाड्या, इ.इ.
दगडी कोळसा, मीठ,
वाफेचे यंत्र, पंप,
मेघवृष्टी,
‘आमची निशाणे’,
गलबते, समुद्र,
आमची निशाणे तारायंत्र,
इ. इ.


कोणत्याही मुलास फी मुळीच पडत नाही. इतकेच नव्हे तर पुस्तके, वह्या, पाट्या व पेनादेखील शाळेतूनच मिळतात. शाळा सुटताना शाळेच्या वस्तू शाळेतच व्यवस्थेने मांडून ठेवण्याची जी कवाईत होते ती प्रेक्षणीय असते. ह्याशिवाय प्रत्येक कौंटीत २० मुलांच्या आणि २० मुलींच्या स्कॉलरशिपांची दरसाल गुणांप्रमाणे वाटणी होते.

मुलांचा शाळेत जो अभ्यास होतो तेवढाच. घरी धडे बिलकूल देत नाहीत. घरी धडे घोकीत बसलेला एकही कोवळा विद्यार्थी मला अझून तरी दिसला नाही. अलीकडे येथे सर्व शाळांतून ड्रॉईंगवर फारच मेहनत घेतली जाते. १२-१४ वर्षांच्या मुलांनी काढलेल्या चित्रांची सुबकता पाहून मन थक्क झाले. चित्रकलेने हातास कुशलता, डोळ्यांस मार्मिकता व चित्तास रसिकता येते. म्हणून ह्या कलेच्या भौतिक, मानसिक व नैतिक गुणांची ह्या लोकांस मोठी चहा वाटत आहे. निदान कमीत कमी १०-१२ तरी चित्रे जीत नाहीत अशी मला ह्या देशात एकही झोपडी अद्यापि आढळली नाही. शेवटी मुलांकडून काही गाणई म्हणून दाखविली. आरंभी हारमोनिअममधून गाण्याचा सूर मास्तर सांगे. नंतर सर्व मुले अशी ठेक्यात म्हणत की जणू एक बँडच. ह्यावरून लहानग्यांसही सुरांची माहिती झालेली दिसली. बायबलाची साधारण माहिती, कोणत्याही विशिष्ट पंथाची मते अगर धर्मवेड मुलांच्या मनात न भरविता. शाळेतूनच देण्यात येते.

शाळा सुटण्याच्या पूर्वी शिक्षकाने प्रार्थना केली. नंतर ‘हे द्याळू पित्या’....अशी आर्थरवाने ह्या अर्भकांची प्रार्थना सुरू झाली. शेवटी प्रभूप्रार्थना संपून तथास्तू (Amen) म्हटल्यावर माझे डोळे उघडले. ते केव्हा मिटले होते हे मला कळलेच नव्हते.

प्रार्थना आटपल्याबरोबर प्रत्येक मुलगा लष्करी थाटाचा सलाम करून आपली टोपी व्यवस्थेने घेऊन बाहेर पडला. व्यायामशाळेत मुलांस लष्करी व साधे ड्रील आणि डंबेल्स शिकवितात. शाळा सुरू असता मुलांस वरचेवर ५-१० मिनिटे पटांगणात खेळावयास सोडतात.

कोणत्याही मोठ्या शहरापासून दूर व समुद्रकाठच्या डोंगराळ प्रदेशातील ह्या क्षुद्र खेड्यातील शाळेची ही व्यवस्था पाहून माझे डोक्यात विचारांचे व मनात विकारांचे काहूर माजले ह्यात काय नवल बरें ! नसतें तर मात्र नवल खरें !!

  1. बहिष्कृत भारत
  2. बंगालची सफर
  3. बंगलूरच्या रस्त्यांतील एक फेरी
  4. प्रेरणा आणि प्रयत्न
  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
Page 102 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी