बहिष्कृत भारत

(मार्च सन १९०९ मध्यें प्रसिद्ध झालेला लेख)

ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातीच्या इतिहासांत जरी कोठे कधीं कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यांत आला असेल आणि जो पुरातन काळापासून चालत येऊन आज पूर्ण दशेला पोंहोंचला असेल, तर तो ह्या भरतखंडातील नीच मानलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कारच होय ! भारतवासियांनो ! स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पातकी आत्मबहिष्कार नाहींसा करा !!

मायो
* सुमारें  एक हजार वर्षांपूर्वीं गुजराथ देशाची पाटण नामें राजधानी होती. तेथे इ. स. १०९४-११४३ पर्यंत सिद्धराजा नावाचा राजा राज्य करीत होता. त्यानें एकदा सहस्त्रलिंग नांवाचा एक मोठा तलाव बांधण्यास सुरुवात केली. पण कांहीं केल्या तलावांत पाणी म्हणून ठरेना. तेव्हां धर्माचार्यांच्या सूचनेवरून राजानें कोणा तरी एकास बळी देण्याचें ठरविलें. ' देवो दुर्बल घातकः !' बली देण्याकरितां मायो नांवाच्या एका धेडास आणून उभें करण्यांत आले. शिरच्छेद करतेवेळीं ''शेवटची काय मागणी असेल ती माग  !''  अशी आज्ञा होतांच मायो गहिंवरून म्हणाला ! ''महाराज ! माझा हा नीच देह सार्वजनिक हिताकडे लागणार ह्याबद्दल मला आनंदच होत आहे. माझ्या तिरस्कृत जातिबांधवांवर आपण एवढीच कृपा करावी की, आजपर्यंत त्यांना शहरापासून दूर अंतरावर जंगलांत राहावें लागत आहे आणि त्यांच्या नीचपणाची खूण म्हणून त्यांना निराळाच पोशाक करावा लागत आहे, तसें ह्यापुढें होऊं नये; त्यांना शहराजवळ राहण्याची परवानगी असावी.''

सिद्धराजानें ही विनंति मान्य केली आणि मायोनें आनंदानें प्राण सोडला !

----------------------------------------------------------
* मासिक मनोरंजन, १९०८
* मुंबई गॅझेटियर, काठेवाड, पुस्तक ८, पान १५७ मा.म.२१.
-----------------------------------------------------------

वाचकहो ! ही साडेसातशें वर्षांपूर्वीं घडलेली गोष्ट वाचून आपल्याला आज काय सुचतें ?  आपल्या ह्या चमत्कारिक देशांत जातिभेदरूपी सहस्त्रलिंग म्हणजे दुहीच्या हजारों खुणा किंवा लहरी दाखविणारा जबरदस्त तलाव आहे. आज हजारों वर्षें ह्यांतलें पाणी स्थिर आहे, पण ह्याच्या तळाशीं गाळामध्यें मायोचे असंख्य नीच मानलेले जातिबांधव जिवंत आणि वंशपरंपरेनें रुतले आहेत. मायोच्या स्वार्थत्यागानें किंवा सिद्धराजाच्या मेहरबानगीनें ह्या जाति जरी नगराजवळ राहूं लागल्या आहेत, तरी नगरवासी होण्यास, अर्थांत् सुधारलेल्या जगांत राहण्यास त्यांना अद्यापि ह्या विसाव्या शतकांतही परवानगी मिळालेली नाहीं ! ह्यांना अद्यापि अस्पृश्यच ठेवण्यांत आलें आहे.

अंत्यज हे कोण आहेत ?

महार, मांग, धेड, पारिया, नामशूद्र इत्यादी ज्या अगदीं नीच मानिलेल्या जाति सर्व हिंदुस्थान देशभर आढळतात, त्यांना ओळखण्याकरितां अद्यापि चांगलेंसें एक सर्वसाधारण नांव प्रचारांत आलेलें नाहीं, आणि तसें एखादें नवीन नांव कल्पून प्रचारांत आणणें हेंही कांहीं सोपें नाहीं. मुंबई शहरांत म्युनिसिपालिटीच्या ह्या लोकांकरितां ज्या स्वतंत्र शाळा आहेत, त्यांना 'निराश्रित शाळा' असें नांव देण्यांत आलें आहे. त्याला अनुसरून ह्या शहरांत 'प्रार्थना समाजा' च्या लोकांनीं ह्या लोकांच्या साहाय्याकरितां जे एक मिशन काढलें आहे, त्याच्या शाळेलाही 'निराश्रित शाळा' असें म्हटलें आहे, परंतु खरें म्हटलें असतां निराश्रित हें नांव ह्या मंडळीस अगदीं अन्वर्थक आहे असें नाहीं. इंग्रजीत Depressed Classes ह्याचें मराठींत शोभेलसें रूपांतर होण्यासारखें नाहीं. ह्या सर्व वर्गांचें एक मुख्य आणि साधारण लक्षण अथवा खूण म्हटली म्हणजे 'अस्पृश्यता' ही होय. ह्यांना शिवून घेण्यांत येत नाहीं. म्हणून ह्यांना अस्पृश्य ह्या नांवानें ओळखावें, तर तो शब्दही चांगलासा प्रचारांत नाहीं व तितका साधा आणि सोपाही नाहीं. पंचम हें नांव अलीकडे मद्रास इलाख्यांत ह्या वर्गाला नवीन देण्यांत आलें आहे, आणि तें यथार्थ असून त्यांत कोणत्याही प्रकारचा तिरस्कार ध्वनित होत नाहीं. पण तें नांव ह्या प्रांती प्रचारांत नाहीं. अंत्यज हा शब्द मात्र बराच व्यवहारांतला आहे. पण हे लोक खरोखरच सर्वांच्या शेवटीं जन्मले, अशांतला मुळींच प्रकार नव्हे!  म्हणून हें नांव त्यांच्यापैकी पुष्कळांना आवडण्यासारखें नाहीं. तथापि वरील सर्व अडचणींचा विचार करितां एकंदरींत तूर्त लेखनव्यवहाराच्या सोईसाठी अंत्यज हेंच नांव नाइलाजाने पसंत करावें लागत आहे, आणि अंत्यज म्हणजे त्यांचा दर्जा हिंदुसमाजांत अगदी खालच्या प्रतीचा अथवा शेवटचा समजला जात आहे असे लोक, एवढाच अर्थ प्रस्तुत विषयासंबंधीं ह्या नांवाचा घेतला आहे.

व्याप्ति आतां प्रथम ह्या अफाट हिंदुस्थानांतील अनेक धर्मांच्या, असंख्य जातींच्या जनसमूहामध्यें ह्या अंत्यज वर्गाची व्याप्ति किती आहे, व अंत्यज ह्या सदराखालीं कोणकोणत्या जाति येण्यासारख्या आहेत व त्या कोणत्या कारणांनीं येतात, ह्याचा विचार करूं. एकंदर हिंदी जनसमूहाकडे पाहिलें असतां त्याच्यामध्यें इतका विचित्रपणा व विस्कळितपणा दिसून येतो कीं, कोणत्याही दृष्टीनें एका विवक्षित कारणासाठीं ह्या जनसमूहाचें नीटसें वर्गीकरण करूं म्हटलें असतां जवळजवळ अशक्यच वाटतें. तथापि आपण हल्लीं प्रचारांत असलेले सर्व जातिभेद व वर्गभेद घटकाभर बाजूस ठेवून केवळ विद्या, आचार, विचार व गृहस्थिति इत्यादि मिळून एकंदरींत सामाजिक दर्जाच्या दृष्टीनें पहातां ह्या अफाट जनसमूहाचे ठोकळमानानें पांच वर्ग करतां येण्यासारखे आहेत.

१ ला. वरिष्ठ वर्ग  :  ह्यांत मोठमोठे अधिकारी, सरदार, मानकरी, मोठमोठे व्यापारी वगैरे बडया लोकांचा समावेश होतो.

२ रा. मध्यम वर्ग  :  ह्यांत साधारण नोकऱ्या करणारे, कलाकौशल्याची कामें करून उदरनिर्वाह करणारे, लहान-लहान दुकानदार व आपल्या मालकीची शेती करणारे वगैरे पांढरपेशांचा समावेश होतो.

३. रा. कनिष्ठ वर्ग  :  आपल्या पोटासाठीं केवळ काबाडकष्ट करणारे, उदाहरणार्थ न्हावी, धोबी, साळी, माळी, स्वयंपाकी, पाणक्ये, शागीर्द, कुणबी इत्यादिकांचा ह्या वर्गात समावेश होतो.

वर सांगितलेल्या तिन्ही वर्गांचा हिंदी समाजांत समावेश होतो. लग्नकार्य झालें तर ब्राह्मण , सरदार आणि युरोपियन अधिकाऱ्यांपासून तों अगदी कनिष्ठ नोकरापर्यंत सर्व एकाच दिवाणखान्यांत जमूं शकतात. एखादी सभा अगर व्याख्यान झालें तर वरील तिन्ही वर्गांपैकी कोणीही सारख्याच हक्कानें येऊं शकतो व त्यांना कोणीही मनाई करूं शकत नाहीं. रोटीबेटीव्यवहाराचा भाग मात्र निराळा. त्या दृष्टीनें पाहतां हिंदी समाजांतच काय, पण हिंदुसमाजांत व त्यांतल्या  कोणत्याही एका नांव घेण्यासारख्या मुख्य जातींत देखील एकोपा नाहीं ! पण सार्वजनिक, किंवा एखाद्या विशेष खासगी प्रसंगीं एकत्र बसणें, उठणें हा जो साधारण सार्वजनिक व्यवहार आहे, त्यांत वरील तिन्ही वर्गांचा सारखाच समावेश होतो. इतकेंच नव्हे, तर अगदीं कनिष्ठ वर्गांतला एखादा न्हावी, धोबी जर आपल्या अंगाच्या करामतीनें आपली विद्याचारसंपन्नता वाढवील, तर त्याला सभेसारख्या सार्वजनिक ठिकाणींच नव्हे, तर लग्नकार्यासारख्या घरगुती प्रसंगींही मानपान देण्यास हल्लीं जुन्या चालींचा देखील कोणी गृहस्थ कचरत नाहीं ! उलट, जर कोणीं वरच्या वर्गांतल्या मनुष्यानें आपल्या बेअकलीपणानें आपली सर्व विद्याचारसंपन्नता घालविली, तर तो वरील मानपानास खास मुकतो; पण तोसुद्धा एकत्र बसण्या-उठण्याच्या सामाजिक हक्काला मुकत नाहीं.

४ था.  हीन वर्ग :  ह्यांत महार, मांग, चांभार, पारिया, शिक्लिया, नामशुद्र, डोंब, धेड, मेहतर, मिरासी इत्यादि अनेक नीच मानलेल्या जातींचा समावेश होतो. हा वर्ग हिंदी समाजाला लागून पण समाजांत नाही असा आहे. समाज ह्यांजवर कांही बाबतींत अवलंबून आहे व ह्या वर्गाची उपजीविकाही समाजावरच चालते. हा वर्ग हिंदी साम्राज्याची कर देणारी रयत आहे. हिंदी राष्ट्राचा योगक्षेम चालवित आलेला हा घटक आहे. पण असें असून हिंदी समाजांत वरील तीन वर्गांप्रमाणें ह्याचा मुळींच समावेश होत नाहीं ! हा वर्ग हीन आहे म्हणून समाजबाह्य आहे. किंवा समाजबाह्य आहे म्हणून हीन आहे, ह्याचा विचार पुढें करूं. पण सध्यां वस्तुस्थिति एवढीच ध्यानांत घ्यावयाची आहे कीं, राष्ट्राचा हा एक घटक असून समाजबाह्य आहे.

५ वा. अलग वर्ग  :  ब्रिटिश राज्य व एतद्देशीय संस्थानें ह्यांच्या सरहद्दीवर डोंगरांतून व जंगलांतून राहणारे कोंग, शिकलगार, चिगलीबगली, भिल्ल, खोंड, सांताळ वगैरे अर्धवट रानटी जातींचा ह्यांत समावेश होतो. हिंदी राष्ट्राशींच मुळीं ह्या वर्गाचा अद्यापि संबंध जडला नाहीं. हे वर्ग सरकारची रयत नाहींत. आपल्या पंचायती ते स्वतःच करितात. शिकारीवर पोट भरलें नाहीं तर परकीयाप्रमाणें आपल्याजवळचा कांहीं ओबडधोबड माल गावखेड्यांतून विकून परत जंगलांत शिरतांत व तेथें परस्परांशीं व सर्व हिंदी समाजाशीं अगदीं तुटून राहतात.

वर जे स्थळ मानानें आपण पांच वर्ग केले, त्यांत ह्या विशाल भरतखंडांतील हल्लीं राहत असलेल्या सर्व मनुष्यप्राण्यांचा समावेश होत आहे. प्रस्तुत विषयाच्या दृष्टीनें पाहतां ह्या पांच वर्गांचे तीन मुख्य भेद होतात. ते असे :

पहिले तीन म्हणजे वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ हे वर्ग हिंदी साम्राज्यांतर्गत असून समाजांतर्गतहि आहेत, म्हणून ते तिन्ही मिळून एक मुख्य भेद समजण्यास कांहीं हरकत नाहीं. चवथा जो हीन वर्ग, तो हिंदी साम्राज्यांतर्गत आहे तथापि समाजबाह्य आहे म्हणून तो निराळा दुसरा मुख्य भेद समजला पाहिजे. पांचवा जो अलग वर्ग तो साम्राज्यबाह्य आणि समाजबाह्य आहे म्हणून तो तिसरा मुख्य भेद होय.

आतां मधला मुख्य भेद जो साम्राज्यांतर्गत असून समाजबाह्य आहे, त्यालाच आपण प्रस्तुत लेखाच्या केवळ सोईसाठीं प्रचारांत असलेलें अंत्यज हें नांव दिलें आहे. ह्याच वर्गाच्या अवनत स्थितीसंबंधीं आमचा आजचा लेख आहे. ह्या गरीब जाति खरोखरच अंत्यज आहेत असें आम्हांला मुळींच वाटत नाहीं; इतकेंच नव्हे तर ह्या अमंगल आणि अन्यायमूलक नांवाचा प्रचार होतां होईल तों लवकर बंद व्हावा अशी आमची इच्छा आहे.  म्हणूनच ह्या निबंधाच्या मथळ्यांत ह्या नांवाचा प्रवेश होऊं न देण्याची आम्हीं मुद्दाम काळजी घेतली आहे.

मूळ

आपल्या देशांत महार, मांग, चांभार, पारिया इत्यादी ज्या अनेक नीच मानलेल्या जाति आहेत, त्यांची बरोबर मूळपीठिका शोधून काढण्यास येथें अवकाश नाहीं. आणि प्रस्तुत तशी जरुरीही नाहीं. ह्यासंबंधी प्राचीन शास्त्रांत या आणि हल्लीं पाहण्यांत व ऐकण्यांत येणाऱ्या कांही थोड्या ढोबळ गोष्टींचा निर्देश केला म्हणजे पुरे आहे. आमच्या आद्य श्रुतींमध्यें व त्यानंतरच्या भगवद्गीतेमध्यें चारच वर्ण सांगितले आहेत. मध्यंतरीच्या स्मृतींमध्यें मनूनें १० व्या अध्यायांत स्पष्ट म्हटलें आहे :

ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥४॥

अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदां जन्मतात; म्हणजे एकदां सृष्टिक्रमानें व मागून उपनयनसंस्कारानें. शूद्र सृष्टिक्रमाप्रमाणें एकदाच जन्मतो, ह्या चारीपेक्षां पांचवा असा वर्णच नाहीं.

म्हणजे चंडाल म्हणून जो वर्ग आहे तो वरील चार जातींचीच कशी तरी भेसळ होऊन झाला आहे, हें त्याच अध्यायांतील पुढील श्लोकावरून उघड होतें.

शूद्रादायोगवः क्षत्ता चंडालश्चाधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकराः ॥१२॥

अर्थ : शूद्र पुरुष आणि त्याच्यावरील वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्यें प्रतिलोम म्हणजे उलट्या शरीरसंबंधामुळें जी प्रजा होते तिला अनुक्रमें अयोगव, क्षत्ता आणि चंडाल अशीं नांवें आहेत, त्यांत शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांची संतति जी चांडाल तिला अत्यंत नीच मानून अस्पृश्य ठेवण्यांत आलें आहे.

मनूनें वर्णसंकराचा जो निषेध केला आहे, तो प्रतिलोमाचाच म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे. ह्याच्या उलट जो अनुलोमसंकर त्याचा निषेध केला नाहीं. स्मृतींत स्पष्ट म्हटलें आहे :

शूद्रायां ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत्प्रजायते ।
आश्रेयान्श्रेयसी जातिं गच्छत्यासप्तमादयुगात ॥
शूद्रो बा्रह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम ।
क्षत्रियाज्जातमेव तु विद्याद्वेश्यात्तथैव च ॥६५॥

अर्थ : शूद्र कन्येला ब्राह्मणापासून कन्या झाली, त्या कन्येला पुनः ब्राह्मणापासून कन्या झाली आणि अशा सात पिढ्या झाल्यावर जी संतति होईल, ती अगदीं ब्राह्मणच उपजली असें होय. ह्याप्रमाणें शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो.

ह्यांतील तत्त्व असें मानलें गेलें आहे कीं, स्त्रीपेक्षा पुरुषाचें अर्थात क्षेत्रापेक्षां बीजाचें सामर्थ्य श्रेष्ठ, म्हणून प्रतिलोमापेक्षां अनुलोम संकर श्रेष्ठ आणि प्रतिलोमांतही स्त्रीपुरुषांत जितकें वर्णांचें जास्त अंतर असेल तितका संकर अधिक निषिद्ध आणि शेवटीं शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांच्यांतील संकर तर अत्यंत अधम होय. तो करणे गुन्हा समजून त्याला अस्पृश्यत्वाची शिक्षा दिली आहे.

गुन्हा आणि कडेलोटची शिक्षा

असो. हा गुन्ह्याचा विचार एकीकडे ठेवला तर वस्तुतः पाहतां शूद्र पुरुष व ब्राह्मणकन्या ह्यांची संतति केवळ शूद्र संततीपेक्षां अधिक श्रेष्ठ असली पाहिजे. मात्र येथें ब्राह्मण, शूद्र इत्यादि जातींचा दर्जा ठरवावयाचा तो केवळ गुणधर्माप्रमाणेंच ठरविला पाहिजे. ह्या दृष्टीनें पाहतां आज अंत्यज मानलेले सर्व लोक वर सांगितल्याप्रमाणें जर खरोखरच शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्रिया यांच्या संबंधापासून उत्पन्न झालेले असते आणि त्यांना आजपर्यंत असली जबर शिक्षा भोगावी लागली नसती, तर त्यांची स्थिती आजच्या केवळ शूद्रांपेक्षा खात्रीनें उच्च दिसून आली असती.

मद्रासेकडील कर्नल आलकाटच्या पारिया शाळेंतील विद्यार्थ्यांची शाळेंतील इतरांच्या मानानें दिसून येणारी प्रगती आणि वऱ्हाड व मध्यप्रांतातील रेल्वेची कंत्राटे वगैरे घेऊन, पुढें सरसावलेल्या कांहीं महार मंडळीची अलीकडे झालेली सुस्थिति, ह्या गोष्टी लक्ष्यांत घेतां असें दिसून येतें की, ह्या तिरस्कृत वर्गांना योग्य रीतीनें थोडीशी सवलत किंवा मदत मिळाली असतां त्यांच्या अंगीं बराच काळ दबून गेलेले चांगले गुण लवकर विकास पावूं लागतात, पण तसा सुयोग फारच विरळा. एकंदरींत ह्या विस्तीर्ण देशांतील ह्या हतभागी लोकांची अवाढव्य संख्या लक्ष्यांत घेतली असतां, ह्यांची स्थिति सर्व बाजूंनीं केवळ शूद्रांपेक्षां अत्यंत हीन झाली आहे, हे उघड होते.

ह्यावरून दोन प्रकारचीं अनुमानें निघतात. एक असें कीं, सांप्रत अस्पृश्य असलेल्या लोकांच्या सर्वच पूर्वजांनीं कांहीं वरील प्रतिलोमसंकरांचा गुन्हा केलेला नसावा. ह्यांच्यांतील बरेच लोक - विशेषतः दक्षिणेकडील जाति - केवळ एतद्देशीय अर्धवट रानटी अनार्य लोक असावे आणि त्यांचा वरील कोणत्याही श्रेष्ठ वर्णाशीं कसलाही शरीरसंबंध झालेला नसावा आणि ज्या अर्थीं भिल्ल, गोंड, वडारी इत्यादि जाति अद्यापि जरी रानटी स्थितींत असूनही त्यांना अस्पृश्य समजण्यांत येत नाहीं, त्या अर्थीं, ह्यांच्यांतील पुष्कळांना ही धर्मशास्त्राची शिक्षा लागू पडत नसावी. दुसरें अनुमान असें कीं, ज्यांच्या पूर्वजांनीं हा गुन्हा केला असेल, त्यांना आजपर्यंत झालेली ही अस्पृश्यत्वाची शिक्षा वाजवीपेक्षां अत्यंत कठोर झाली आहे. त्यांची स्थिति केवळ शूद्राच्यापेक्षां स्वभावतः बरी असावी, ती तशी नसून उलट इतकी हीन झाल्यामुळें नुसतें त्यांचेच नव्हे तर राष्ट्राचेंही जबर नुकसान झालें आहे.

शिक्षेचा सूड
आर्य-अनार्यांचा विरोध उत्तर हिंदुस्थानापेक्षां दक्षिणेंतच जास्त दिसून येतो. त्यांत कर्नाटकाच्या खालीं दक्षिणेंत जसजसें जावें तसतसें तर हा स्पृश्यास्पृश्यविधि अधिक तीव्र होत जातो. रंग, चेहरा, चालीरीति वगैरेवरून पाहतां कर्नाटकांतील व्हलिया  (महार), मादिग (मांग) इत्यादि ज्या जाति आहेत; त्यांचा वरच्या जातींशीं फारच कमी संकर झालेला असावा असें दिसतें. हे आपल्याला मूळचे एतद्देशीय समजतात, ह्यांना जंबु असेंही नांव आहे, ह्यांचा मूळ पुरुष जंबु नांवाचा होता. पूर्वीं पृथ्वीचा हा भाग दलदलीचा आणि डळमळीत होता. तो *जंबूनें आपल्या मुलास जिवंत पुरून स्थिर केला, अशी ह्या लोकांमध्यें दंतकथा आहे. ह्या दंतकथेंत जरी विशेष तथ्य नसलें, तरी आर्य लोकांनीं ह्यांच्यापासून जमीन हिसकावून घेऊन तिला पुढें जंबुद्वीप हें नांव दिलें असावें, हें कांही अंशी संभवतें. ह्या लोकांचा आर्यांच्या तीन वर्णांशी जरी फार क्वचितच संकर झालेला दिसतो, तरी जेव्हां जेव्हां तो झाला तेव्हां तेव्हां त्याचा परिणाम फारच भयंकर झाला असावा, हें खालील आख्यायिकेवरून दिसून येतें.

ह्या व्हलिया जातींत * पोतराज (रेडयाचे राजे) ह्या नांवाची एक शाखा आहे. कर्नाटकांतील बहुतेक लहान मोठ्या गांवांत जेव्हां पटकी वगैरे भयंकर व्याधीच्या शमनार्थ द्यामव्वाची (दुर्गादेवीची) जत्रा गावकऱ्यांकडून करण्यांत येते; तेव्हां हे पोतराज - मुख्य हक्कदार, जत्रेंतले अध्वर्यूच असतात. जत्रेंत पुष्कळ रेड्यांचा वध होत असतो, त्यांतील मुख्य रेड्याचें शिर डोक्यावर घेऊन ह्या पोतराजांस, गांवपंचांस बरोबर घेऊन नगरप्रदक्षिणा करावयाची असते. ह्या पोतराजांच्या उत्पत्तीसंबंधीं अशी एक चमत्कारिक दंतकथा आहे कीं, यांच्या मूळ पुरुषानें आपण ब्राह्मण आहों असें भासवून द्यामव्वा नांवाच्या एका ब्राह्मणीशीं विवाह केला. पुढें जेव्हां तिला पोतराजाची हीन जात कळून आली, तेव्हां तो भिऊन रेड्याचें रूप घेऊन पळाला. द्यामव्वानें आपल्या घरास आग लावून पोतराजाचा पाठलाग केला आणि त्याचा वध केला.

-------------------------------------------------------------
* मुंबई गॅझेटियर सन (१८८४), पुस्तक २२, पान २१४-१७.
-------------------------------------------------------------

मागें केव्हां तरी एखाद्या प्रमुख अनार्यानें आर्यस्त्रीशीं वर्णसंकर केला असेल व त्यावरून ही भयंकर झटापट झाली असेल. हल्लीं अमेरिकेंत एखाद्या गौरकाय तरुणीवर एखाद्या काळया निग्रोनें हात टाकला तर कायद्याची वाट न पाहतांच सार्वजनिक रीतीनें त्याचा वध करण्यांत येतो, त्याला लिंचिंग असें म्हणतात. हें लिंचिंग जरी हल्लीं आमच्या देशांत उघडपणें होत नाहीं, तरी आजपर्यंत कर्नाटकांत ह्या प्राचीन लिंचिंगचें ओबडधोबड स्मारक ह्या जत्रेच्या रूपानें राहिलें आहे. अजूनही हे पोतराज ह्या जत्रेच्या शेवटीं देवीच्या समोर तिला शिव्याशाप देत, कित्येक गरीब कोंवळ्या कोंकरांना हातांत धरून दांतानें त्यांच्या अंगावरचें सर्व कातडें जिवंतपणीं सोलतात ! हीं कोंकरें म्हणजे मूळ द्यामव्वा नांवाच्या ब्राह्मणीचीं मुलें असें मानून त्यांचा असा भयंकर घात करून हे लोक आपल्या मूळ पोतराजाच्या लिंचिंगचा सूड उगवितात.

मराठे वगैरे जातीशीं ह्यांचें साम्य

हल्लीं ह्या देशांतील नीच मानिलेल्या एकंदर लोकांची स्थिति किंचित सहानुभूतीच्या दृष्टीनें आणि उदार बुद्धीनें अवलोकन केल्यास असें दिसून येईल कीं, ह्यांच्यामध्यें अनेक प्रसंगीं अनेक कारणांनीं वरील पुष्कळ जातींची भेसळ होत आहे. गुजराथ, सिंध, गंगथडी इत्यादि प्रांतांत रहाणाऱ्या मेघवाल महारांचें असें म्हणणें आहे कीं, मागें काठेवाडांत एकदा बारा वर्षांचा दुष्काळ पडला होता, तेव्हां मेलेलीं जनावरें उचलून नेण्याचें काम केल्यामुळें त्यांना ही हीन दशा आली. * काठेवाडाकडील भंग्यांचे सहा पोटभाग आहेत, त्या सर्वांची नांवें पुढीलप्रमाणें अस्सल रजपुतांचीं आहेत. १. मकवान, २. परमार (पवार), ३. राठोड, ४. सोळांकी, ५. वाघेला व ६. डोरी. महाराष्ट्रांतील महारांमध्येंही मराठ्यांच्या अस्सल ९६ कुळांपैकीं बऱ्याच कुळांचीं नांवें आढळतात.  तीं जाधव, साळुंके, चालुक्य, पवार, मोरे (मौर्य), गाईकवाड, शेलार, साळवी, सुरवसे, (सुर्यवंशी) इत्यादि.

-------------------
* मुंबई गॅझेटियर महिकाठा, पुस्तक ५, पान ६३
-------------------

महाराष्ट्रांतील महारांची भाषा पाहिली असतां त्यांचे उच्चार, स्वर व एकंदर बोलण्याची ढब मराठी कुणब्यांसारखीच आहे असें दिसून येतें. कोळी वगैरे गांवांत राहणाऱ्या खालील जातीच्या लोकांच्या भाषेंत कांहीं फरक दिसतो, पण ह्या बहिष्कृत लोकांच्या भाषेंत तितका फरक दिसत नाहीं. ह्यांच्या देव्हाऱ्यांवर खंडोबा, बहिरोबा, भवानी वगैरे मराठ्यांच्याच देवतांच्या मूर्ति दिसतात. नाशिक, त्र्यंबक, पैठण, पंढरपूर, तुळजापूर इत्यादी क्षेत्रांचे ठिकाणीं इतरांबरोबर ह्यांची गर्दी जमते आणि वारकरी, कथेकरी, भाविणी, बाघ्ये वगैरे धर्मसंप्रदाय मराठ्यांप्रमाणें ह्यांच्यांतही पूर्वींपासून चालू आहेत. ह्या सर्व गोष्टींत ह्यांनीं आपल्याला उच्च म्हणविण्यासाठींच मराठ्यांचे केवळ अनुकरण केलें असावें असें म्हणावें, तर ह्यांच्या वरच्या कोळी वगैरे जातींनीं हें अनुकरण कां केलें नाहीं ? शिवाय, अनुकरण करून आपल्यास उच्च म्हणवून घेण्याचें चातुर्य ह्यांच्यांत असतें तर तें ह्यांनीं मराठ्यांचेंच कां केलें ?  सर्वांत उच्च समजले गेलेले जे ब्राह्मण, त्यांचें अनुकरण ह्यांनीं कां केलें नसावें ?

ह्यांच्या अंगचे गुण

ह्या लोकांत इमानीपणा, करारीपणा, शौर्य इत्यादि नैतिक गुण अगदीं उपजत असलेले आढळतात. महारासारखी निमकहलाल जात दुसरी क्वचितच सांपडेल. म्हणूनच जुन्या व अलीकडच्या अमदानींतदेखील रखवालदारीचें, सरकारी पोतें पोंहोंचतें करण्याचें वगैरे विश्वासाचीं कामें ह्या लोकांकडेच चालत आलेलीं आहेत. मद्रास इलाख्यांत अव्वल इंग्रजीचा पाया घालण्याच्या कामीं ज्या लढाया झाल्या, त्यांत तिकडच्या पारिया मंडळीनें अतुल बहाद्दरी गाजविली आहे. क्लाइव्हच्या सैन्यामध्यें गोऱ्या सोजिरांस भात देऊन आपण वरचें नुसतें पाणी पिऊनच ह्या पारिया पलटणींनीं लढाया जिंकिल्या, अशी तिकडे प्रसिद्धि आहे; पण बिचाऱ्यांचा इतिहास लिहितो कोण !

आत्मिक गुणांचीही ह्या लोकांत वाण नाहीं. उत्तरेकडे रोहिदास चांभार व महाराष्ट्रांत चोखोबा महार हे महान् साधुपुरुष प्रसिद्धच आहेत. ''बुद्धि, विद्वत्ता आणि साधुता ह्यासंबंधीं प्राचीन काळीं पुष्कळ पंचम वर्गांचे लोक प्रसिद्धीस आले होते. आद्यकवि वाल्मिकी हा पंचम जातीचा होता, अशी कथा आहे. पद्मपुराण व ज्ञानवासिष्ठ ह्यावरून ह्या कथेला दुजोरा मिळतो. सुप्रसिद्ध ग्रंथ 'कुरळ' ह्याचा कर्ता तिरुवेल्लुवर आणि वैष्णव लोकांनीं पूज्य मानलेले जे बारा संत झाले, त्यांपैकीं एक तिरूप्पानियल्वर हे दोघेही मुळीं पंचम जातीचेच होते. यमुनाचार्यांचेच शिष्य भार्नर नंबियर हे एक महान पंडित साधू झाले. ते पंचम असूनही त्यांना ब्राह्मण संन्याशाप्रमाणें समाधी देण्यांत आली.'' *

-------------------------------
* मि. सी. वाय. चिंतामणी ह्यांनी प्रसिद्ध केलेल्या इंडियन सोशल रिफॉर्म ह्या पुस्तकातील मि. के. रामानुजाचार्य एम. ए. बी. एल. ह्यांचा निबंध पाहा.
-------------------------------

दुराग्रह टाकून ह्या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार केला असता कळून येते की, हल्ली नीच मानलेल्या ज्या असंख्य जाति ह्या अफाट देशांत पसरल्या आहेत, त्यांचे खरे मूळ काय हे ठरविणे जरी कठीण आहे व पूर्वींपासून वरच्या जातींतून ह्यांच्यात कशी कशी भर पडत गेली आहे तेंही कळण्यास जरी फारसा मार्ग नाहीं, तथापि एवढें मात्र उघड आहे कीं, ह्या वर्गाचे सर्वच लोक जितके मानण्यांत येत आहेत तितके मुळापासूनच नीच नाहींत. त्यांच्यांत वरिष्ठ वर्गापासून तो कनिष्ठ वर्गापर्यंत सर्वांचें अनेक कारणामुळें देशकालमानानें मिश्रण होत आलें आहे; आणि आज हजारो वर्षें ह्यांच्याशीं वरील वर्गांचा व्यवहार जबरीने बंद पाडल्यामुळें ह्यांची अर्थातच अशी हीन आणि करुणास्पद स्थिति झाली आहे.

आजकाल आमच्या देशांत लहानमोठ्या सर्वांच्या अगदीं परिचयांतली अशी गोष्ट म्हणजे बहिष्कार ही होय.

ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातींच्या इतिहासांत जर कां कोठें, कधीं कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यांत आला असेल, व जो पुरातन काळापासून चालत येऊन हल्लीं पूर्णदशेला पोंहोंचला असेल, तर तो ह्या नीच मानलेल्या जातीवरचा हा भयंकर बहिष्कार होय  !!

मनुस्मृतीच्या दहाव्या अध्यायांत ह्या बहिष्काराचा सुमारें दोन हजार वर्षांपूर्वींचा असा दाखला आढळतो :

चांडालश्वपचानां तु बहिर्ग्रामात्प्रतिश्रयः ।
अपपात्राश्च कर्तव्या धनमेषां श्वगर्दभम् ॥५१॥
वासांसि मृतचैलानि भिन्नभांडेषु भोजनम् ।
कार्ष्णायसमलंकारः परिव्रज्या च नित्यशः ॥५२॥
न तैः समयमन्विच्छेत्पुरुषो धर्ममाचरन् ।
व्यवहारी मिथस्तेषां विवाहः सदृशैः सह ॥५३॥
अन्नमेषां पराधनं देयं स्याध्दिन्नभाजने ।
रात्रो न विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च ॥५४॥
दिवा चरेयुः कार्यार्थ चिह्यिता राजशासनेः ।
अबांधवं शवं चैव निर्हरेयुरिति स्थितिः ॥५५॥
वंध्याश्च हन्युः सततं यथाशास्त्रां नृपाज्ञया ।
वध्यवासांसि गृण्हीयुः शय्याश्चाभरणानि च ॥५६॥

अर्थ : चंडाल, श्वपच इत्यादि जातींनीं गांवाबाहेर रहावें, ह्यांच्याजवळ भांडीं नसावीं; कोंबडी आणि गाढव हेंच ह्यांचें धन; प्रेतावरचे कपडे हींच ह्यांचीं वस्त्रें; ह्यांनीं फुटक्या मडक्यांत खावें, काळ्या लोखंडाचे अलंकार ल्यावे, नित्य भटकत असावें; इतरांनीं ह्यांच्यांशीं कसलाही व्यवहार करूं नये; त्यांना पाहूंही नये; ह्यांना अन्न द्यावयाचें असल्यास दुसऱ्यांकडून खापरांतून देववावें; शहरांत किंवा खेड्यांत ह्यांनीं रात्रीं येऊं नये; दिवसा कामासाठींच कांहीं चिन्ह धारण करून यावें; तें काम म्हणजे बेवारशी प्रेत नेणे, देहान्त शिक्षा झालेल्यांचा राजाज्ञेनें वध करणें व त्यांचे कपडे, दागिने वगैरे घेणें हीं होत.

दोन हजार वर्षांहूनही अधिक काळपर्यंत अशा ह्या घोर बहिष्काराचें, जबरीचें वंशपरंपरागत वतन स्वीकारावें लागल्यामुळें, ह्या हतभागी लोकांची जी अवनति झाली आहे, तिच्याविषयीं यथार्थ ज्ञान इतरांना होणें कठीण ! इतकेंच नव्हे, तर स्वतः या लोकांनाही करून देणें जवळ जवळ अशक्य आहे !  असा बहिष्कार कधीं आणि कोठेंही घालण्यांत आला नसावा ! जरी असेल तरी त्याला इतकी पूर्ण सिद्धी आलेली नाहीं हें अगदीं खास.  ह्या बहिष्कार-कुठाराला दोन धारा आहेत. एका धारेनें ज्यांच्यावर हा बहिष्कार आहे, त्यांची स्वाभिमानबुद्धि कापून नष्ट केलेली आहे. ह्या दैवहतकांचा उपजत स्वाभिमान असा नष्ट झाल्यामुळें जरी कदाचित् कोणी अपवादक दयेने प्रेरित होऊन ह्यांना जवळ करण्यास गेला, तरी दोन हजार वर्षांच्या संवयीमुळें हे स्वतःच आपल्या हितकर्त्यापासून दूर दूर पळतात  ! कारण, सवय म्हणजे दुसरा स्वभावच ! उलटपक्षी, ह्या कुठाराच्या दुसऱ्या धारेमुळें ज्या उच्च वर्गांनी हें बहिष्कारशस्त्र पिढ्यान् पिढ्या आपल्या हातांनीं चालविलें त्यांच्या, ह्या लोकांसंबंधीं विवेक आणि करुणा ह्या दोन्ही शक्ति नष्ट झाल्या आहेत ! सर्व माणसांनी आपल्या गुणकर्माप्रमाणें गुजारा करावा, त्यांत कोणी कोणास अडथळा करूं नये व हा उपजत हक्क ह्या नीच मानलेल्यांना आहे, हें साधें आणि उघड तत्त्व दुसऱ्यांना नीच मानणाऱ्या व आपल्याला उच्च म्हणविणाऱ्या कोळ्या-माळ्यापासून तों क्षत्रिय-ब्राह्मणापर्यंत कोणालाही मान्य होत नाहीं; ह्यांत त्यांचा कांहीं जाणूनबुजून अविचार किंवा कठोरपणा आहे, असेंच केवळ नव्हे; तर हा प्रताप केवळ त्या बहिष्कार-कुठाराच्या दुसऱ्या धारेचा ! तिच्यामुळें ह्या स्वतःस उच्च म्हणविणाऱ्या व दुसऱ्यांना नीच मानणाऱ्या लोकांचा साहजिक विवेक आणि दया नष्ट होऊन ह्यांना संवयीनें असें वाटत आहे कीं, नीच मानलेल्या लोकांस देवानेंच ज्या अर्थी ह्या स्थितींत उत्पन्न केलें आहे, त्या अर्थी तीच स्थिति त्यांना योग्य आहे व म्हणून तिजबद्दल कोणालाही दोष देतां येणार नाहीं.

ह्यापेक्षां थोडा अधिक विचार केल्यास हे लोक असेंही म्हणूं लागतात कीं, ह्या नीच मानलेल्या लोकांस जर उच्च स्थितींत आणिलें, तर ते हल्लीं जी समाजाचीं मलमूत्र साफ करण्यासारखीं हलकीं कामें करीत आहेत तीं पुढें कोण करील ? जर कोणी तीं कामें करील तर तेही असे नीच मानण्यांत येतील ! त्यापेक्षां हेच ह्या अवस्थेंत आहेत हें काय वाईट ?

सुधारकांनीं विधवाविवाहाची प्रथम जेव्हां चर्चा सुरू केली, तेव्हां विधवांचीं लग्नें झाल्यास कुटुंबांत पोळ्या लाटण्याचें, मुलांचीं हागओक काढण्याचें, केरपोतेरे करण्याचें व अशींच दुसरीं फुकट्या मोलकरणींचीं कामें कोण करील ?  अशी एक मोठी अडचण त्यांचे प्रतिपक्षी काढीत असत ! ती लक्ष्यांत घेतली असतां वरील शंका पाहून फारसें आश्चर्य वाटावयास नको ! स्वतःच्या आयाबहिणी आणि मुली ह्यांच्यासंबंधीं देखील ज्यांची साहजिक दया, प्रेम व विवेक केवळ संवयीच्या जोरानें नष्ट होऊन जे असले कोटिक्रम करण्यास तयार होतात, ते गांवाबाहेरील महार-मांगांविषयीं वरील शंका काढतील यांत नवल काय ?  समाजाचीं असलीं घाणेरडीं कामें अनादिकालापासून माणसेंच करीत आलीं आहेत, आणि अनंत कालापर्यंत माणसांनींच ती केलीं पाहिजेत, किंबहुना माणसांनाच तीं करावीं लागतील, असें कांही खात्रीनें म्हणतां येणार नाहीं. मुसलमान लोक इकडे येण्याचे पूर्वी ह्या देशांत पायखान्यांची व्यवस्था हल्लीं आहे अशीच होती कीं काय ?  असती, तर मनुस्मृतींत चंडालाकरितां जी सर्व नीच कामें सांगितलीं आहेत, त्यांत ह्यांचा उल्लेख झाल्याशिवाय राहताना.*  ह्या प्रांतांत म्युनिसिपालिट्यांची स्थापना झाल्यावर पायखाने साफ करण्याकरितां भंगी लोकांना गुजराथ, काठेवाड आणि पंजाब येथून आणावें लागलें. कारण येथील कोणीच अंत्यज मंडळी हें काम पत्करीना. ह्यावरून पायखान्यांची ही चाल उत्तरेकडूनच आली असावी, व ज्या अर्थी भंगी लोकांमध्यें बहुतेक मुसलमानच फार आहेत, त्या अर्थीं ही चाल मुसलमानांकडून प्रथम आली असावी, असें अनुमान करण्यास हरकत नाहीं. यद्यपि, भंगी लोक मुसलमानांतून आले नसले, तरी आज ज्या असंख्य लोकांवर हा सार्वजनिक बहिष्कार पडला आहे, ते सर्वच कोठें भंगी आहेत ? आणि जे फार थोडे भंगी आहेत त्यांच्यावर तरी असा बहिष्कार कां असावा ? इराण, अरबस्थान वगैरे मुसलमानांच्या देशांत, किंबहुना पृथ्वीवरच्या कोणत्याही देशांतील भंगी लोकांवर हा बहिष्कार नाहीं; मग आमच्याच देशांत हा राष्ट्रघातकी सोंवळेपणा कां असावा ?
-------------------------
* मुंबई गॅझेटियर, ठाणे, पुस्तक १३, भाग १, पान १९०.
-------------------------

महार, चांभार, मांग, ढोर वगैरे सर्व अस्पृश्य वर्ग आमच्या हिंदुधर्मांतच मोडतात, ह्यांना जर कोणीं परधर्मीयांनीं बाटविलें आणि त्यांची स्थिति सुधारली, तर आम्ही धर्माभिमानी आमच्या धर्माची महान हानि झाली म्हणून आक्रोश करितों, पण ज्या महारांना ते हिंदु धर्मांतच राहून कितीही चांगले धंदे करून संपन्न असले तरी आम्ही स्पर्श करण्यास किंवा आमच्या उंबरठ्याचे आंत येऊ देण्यास तयार नसतों, तेच महार ख्रिस्ती किंवा मुसलमान झाले कीं, त्यांच्याशीं हात हालविणें किंबहुना प्रसंगी आडजागीं एकादा चहाचा पेलाही झोंकणें, ह्यात आम्हांला कांहीं वाटत नाहीं ! मग हा जो बहिष्कार आहे, तो ह्या अंत्यज मंडळीवर की त्यांच्यामध्यें असलेल्या हिंदुधर्मावर ?  एका बाजूनें अशा मंडळीस ख्रिस्ती मिशनऱ्यांनीं बाटविले कीं, आक्रोश करावयाचा, आणि दुसऱ्या बाजूनें अशा ह्या बाटग्या अंत्यजांवरचा सर्व बहिष्कार काढून त्यांना उद्योगधंद्यांत आणि स्पर्शव्यवहारांत मोकळीक ठेवावयाची, आणि जे हिंदु राहिले त्यांचा मात्र तिरस्कार करावयाचा, हा कोण विसंगतपणा !

मनुस्मृतींत दहाव्या अध्यायांत स्पष्ट म्हटलें आहे -

शत्तेफ्नापि हि शूद्रेण न कार्यो धनसंचयाः ।
शूद्रो हि धनमासादय ब्राह्मणानेव बाधते ॥१२९॥

अर्थ - अंगीं सामर्थ्य असलें तरी शूद्रानें धनसंचय करू नये, कारण अशापासून ब्राह्मणास बाधा होते.

शूद्रालाच संपन्नता मिळविण्याची धर्मशास्त्रांत परवानगी नाहीं ! मग अतिशूद्राला ती कोठून असणार ?  पण अशा अतिशूद्रानें वाटल्यास ह्या हिंदुधर्माच्या कचाट्यांतून सुटून परधर्मांत जावें. म्हणजे त्याला मनुष्यजातीचे सर्व उपजत हक्क मिळतात ? असें समजून वरील विसंगतपणा टाळावयाचा कीं काय ?

ह्या लोकांच्या पूर्वजांनीं असा कोणता गुन्हा केला असेल कीं, त्यांच्या वंशजास आम्हीं अजूनही अशी भयंकर सजा द्यावी ?  वर्णसंकर, व्यभिचार, देशद्रोह, राजद्रोह, धर्मद्रोह ह्यांपैकी कोणताही भयंकर गुन्हा, हल्लीं कोणी करीत नाहीं काय ?  जे करतात त्यांना अशी जबर शिक्षा हल्लीं समाजाकडून होत आहे काय ?  तर मग, ह्यांच्या पूर्वजांनीं तो केला म्हणून ह्यांनाच हा बहिष्कार भोगावा लागतो, ह्याचें कारण काय ?  केवळ रूढी चालत आली आहे, आणि ह्या बाबतींत पुढारी मंडळी जोरानें चळवळ करून लोकमत जागृत करीत नाहीं व सतत प्रयत्न होत नाहीं, म्हणूनच हा प्रकार चालू आहे. ईश्वरानें निर्माण केलेला असा कोणताही प्राणी नाहीं कीं, तो अस्पर्श मानला आहे ! मनुष्यप्राण्यांपैकीं मात्र ह्या लोकांना बाहेर ठेवलें जात आहे ! महाराच्या घरच्या कुत्र्यालाही आम्ही शिवूं, पण त्या महाराला शिवणार नाहीं  !

बहिष्कारामुळें झालेली हल्लींची स्थिति

वर सांगितल्याप्रमाणें आज हजारों वर्षें हा असा बहिष्कार भोगल्यामुळें व हल्लींच्या प्रगतीच्या काळींही हा बहिष्कार व्हावा त्या मानानें कमी न झाल्यामुळें, ह्या दुर्दैवी लोकांची स्थिति सांपत्तिक, नैतिक व धार्मिक इत्यादि सर्वच बाजूंनीं अगदीं करुणास्पद झाली आहे. तथापि कांहीं सुशिक्षित मंडळींस हें म्हणणें पटत नाहीं, ह्याचें कारण असें कीं, अलीकडे रेलवे वगैरे संबंधीं लहानमोठी कंत्राटें घेऊन क्वचित् महार मंडळी चांगली श्रीमंत झालेली आढळते; पण असे अपवाद किती थोडे आहेत ह्याचा विचार करावयाला नको काय ?  दुष्काळ किंवा प्लेग वगैरे आधिदैविक संकटें ह्या गांवाबाहेरच्या लोकांस कशीं भोंवतात, त्यांची प्रत्यक्ष उदाहरणें डोळे उघडे ठेवणारास पावलोपावलीं दिसून येतील.

कोणी कोणी असेंही म्हणतात कीं, नीच मानलेल्या लोकांना वाटेल तें काम करण्याची मुभा असल्यामुळे त्यांना इतरांपेक्षां मजुरी चांगली मिळते. हाडें, कातडें, चरबी वगैरे संबंधी सर्व उद्योग चांभार, ढोर ह्या खालच्या जातींकडेच आहे हें खरें; पण ह्या धंद्यांत केवळ मजुरी मात्र ह्या लोकांकडे राहिली आहे व भांडवल आणि व्यापाराचा सर्व फायदा उच्च वर्गाच्या हिंदूंनीं नसला तरी मद्रासी मुसलमान व बोहऱ्यांनीं बळकाविला आहे. याचें कारण हेंच कीं, या लोकांची सभ्यता, संस्कार व एकंदरीत सर्व सामाजिक स्थिति बहिष्कारामुळें अत्यंत हीन राहिल्यामुळें, जरी चांभार वगैरे वर्गाची मिळकत व पुंजी कोळ्यामाळ्यापेक्षा बरी असली, तरी त्या स्थितीचा फायदा घेऊन यांना आपली हिंदुसमाजांत बढती करून घेण्यास कांहीं वाव उरला नाहीं. यामुळें आपलें वडिलोपार्जित डबोलें चुलीजवळ पुरून ठेवून फाटकी लंगोटी आणि फुटकें मडकें यांवरच पिढ्यान पिढ्या गुजारा करण्याची चांभार वगैरे जातींना संवय लागली आहे. बहिष्काराचा वरवंटा डोक्यावर सारखा फिरत असल्यामुळे त्याखालीं त्यांच्या महत्त्वाकांक्षेला अवकाशच रहात नाहीं. असा प्रकार असतांना त्यांची सांपत्तिक स्थिति चांगली आहे म्हणून एखाद्या कुणब्याला हेवा वाटेल काय ?  सुशिक्षित मंडळीकडूनच असा आक्षेप केव्हां केव्हां निघतो, ह्याचें कारण केवळ बहिष्कार-कुठाराच्या दुसऱ्या धारेचा परिणामच होय. दुसरें काय !

केवळ शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनें पाहतांही ह्या लोकांच्या स्थितींत कसा फरक दिसून येतो, त्याचा एक मासला खालील आकड्यांवरून दिसेल. हे आंकडे इ. स. १९०१ सालच्या हिंदुस्थानच्या खानेसुमारीवरून घेतलेले आहेत.
मुंबई इलाखा (PDF साठी येथे क्लिक करा)

नैतिक बाबतींत विशेष लिहावयास नकोच ! अलीकडच्या कोणत्याही लष्करी छावणींत गेल्यास तेथें ज्या हतभागी स्त्रियांनीं दुकानें मांडून स्वतःचे देह विकावयास ठेविलेले आढळतात त्या कोणत्या वर्गांतल्या असतात हें प्रसिद्ध आहे.

धार्मिक बाबतींत तर विचारच करावयाला नको. हिंदुधर्म बोलूनचालून ह्या वर्गांसंबंधीं बेजबाबदार ! इतकेंच नव्हे, तर त्यानें आज इतकीं वर्षें ह्या पामरांवर बहिष्कारशस्त्र धरलें आहे. वास्तविक पाहतां, हे धर्मबाह्यच आहेत. अलीकडील देशाभिमानाचें वारें अंगांत शिरल्यापासून कांहीं 'दे. भ.', 'दे. बं.' ह्या वर्गांशीं नुसता शाब्दिक आपलेपणा जोडीत आहेत; पण खरे धर्माभिमानी ह्यांना कितपत आपले म्हणतात हें जगजाहीर आहे ! मुसलमानांनींही आजवर ह्यांचा तिरस्कारच केला आहे. मुसलमानांचा सगळा रोंख हिंदु म्हणविणारांना बाटविण्याकडे होता. तेव्हां त्यांना ह्या ग्रामबाह्य लोकांना सहज मुसलमान करून घेतां आलें असतें; परंतु तसा प्रकार कोठें आढळत नाहीं, ह्यावरून अव्वल मुसलमानींत ह्या वर्गाची गणना हिंदूंत होती की नाहीं, ह्याबद्दल शंका येते. ख्रिस्ती मिशनऱ्यांनीं मात्र ह्यांच्यासाठीं पुष्कळ प्रयत्न चालविले आहेत व त्यांत त्यांना बरेंच यशही आलें आहे. केवळ परोपकाराच्या दृष्टीनें पाहतां इतर बाबतींप्रमाणेंच ह्याही बाबतींत ख्रिस्ती धर्माची आणि मिशनरी मंडळीची, करावी तितकी स्तुति थोडीच आहे.

एकंदरींत कोणत्याही दृष्टीनें पाहतां हल्लीं अस्पृश्य मानलेल्या ह्या वर्गाची स्थिति अत्यंत शोचनीय आहे, हें आपल्यांपैकीं पुष्कळांस कबूल होत नसल्यास इतकेंच म्हणणें भाग पडतें कीं 'जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे !'  पण राष्ट्रीय दृष्टीनें पाहतां यांची स्थिति सर्व राष्ट्राला घातक आहे, हें तरी निदान त्यांच्या वंशास न जातांहि कळावयाला पाहिजे आहे !

संख्या

येथवर ह्या हतभागी लोकांची मूळ उत्पत्ती, त्यांच्यावर पुरातन काळापासून आजपर्यंत पडलेला घोर बहिष्कार व त्यामुळें त्यांची सर्व बाजूंनीं आज दिसून येणारी हीनदीन स्थिति वगैरे, गोष्टींचा स्थूल दृष्टीनें विचार केला. आतां ह्या अफाट देशांत अशा हीन दशेप्रत पोहोंचलेल्या वर्गांतील लोकांची एकंदर संख्या किती आहे, हें पाहूं.

वर सांगितलेल्या भयंकर अन्यायाचे प्रसंग ह्या लोकांवर कितीहि गुदरले असले, आणि सहृदय मनुष्यास लाज आणणारे हे प्रकार हजारों वर्षें जरी घडत असले, तथापि त्याचा दुष्परिणाम ज्यांना प्रत्यक्ष भोगावा लागतो, अशांची संख्या अगदीं थोडीथोडकी असती, आणि मग तिकडे आमच्या लोकांनीं दुर्लक्ष्य केलें असतें, तर एकादे वेळीं चाललें असते ! कारण, हल्लीं आमच्या देशाचा पाया सर्वच दिशांनीं पाहतां खोलांत चालला आहे, अशा वेळीं आमच्या पुढाऱ्यांना पुष्कळ मोठमोठ्या राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींत मन घालावें लागत असल्यामुळें कांहीं व्यक्तींवर, किंबहुना एकदोन जातींच्या एक दोन लाख माणसांवर एकादा स्थानिक अथवा प्रासंगिक तात्पुरता अन्याय होत असता आणि तिकडे आमच्या उद्योगी पुढाऱ्यांचें लक्ष वेधलें नसतें, तर त्यांत फारसें आश्चर्य नव्हतें. पण वस्तुतः तसा प्रकार मुळींच नाही ! उलट अतिशय आश्चर्याची गोष्ट ही कीं, हिंदु साम्राज्यांत ह्या अंत्यज वर्गाची प्रचंड संख्या असून व ती ह्या खंडवजा विशाल देशांत सर्वत्र पसरली असून, ती किती आहे व कशी पसरली आहे, ह्याची बरोबर कल्पना करून घेण्याची कोणाला इच्छाहि होत नाहीं ! दर दहा वर्षांनीं सरकारी खानेसुमारींत ह्या वर्गाची संख्या प्रसिद्ध होत असते. तथापि ती एकत्र केली असतां किती मोठी होईल, हें देखील कोणी पाहण्याची तसदी घेत नाहीं  !

ता. ३१ मार्च १९०१ रोजीं रात्रीं करण्यांत आलेल्या हिंदी साम्राज्यांतील (बलुचिस्थान, ब्रह्मदेश, निकोबार, अंदमान हीं सर्व मिळून) खानेसुमारीवरून हिंदुस्थानची एकंदर लोकसंख्या २९,४३,६१,०५६ होती. ह्यांत एकंदर अंत्यज संख्या ५,३२,३६,६३२ आहे. हा एकूण आंकडा सन १९०१ च्या सेन्सस रिपोर्टाच्या भाग १, पान ५६०-५६९ मध्यें जी जातवारी दिली आहे; हा तिच्यावरून तयार केला आहे. तयार करतांना मूळ कोष्टकांत ज्या जातींना Untouchable or Depressed Classes म्हणजे अस्पृश्य अथवा निकृष्ट झालेल्या जाति असें नांव दिलें आहे, त्यांचाच अंत्यज नांवाखालीं समावेश करण्यांत आला आहे. मुसलमान लोकांमध्येंहि अश्राफ (वरिष्ठ) अजलाफ (मध्यम) आणि अर्जाल (हीन), असे भेद दाखविण्यांत आले आहेत व त्यांची संख्या उत्तर हिंदुस्थानांतील गणतीमध्यें निरनिराळी दाखविली आहे. अर्जाल वर्गाचे मुसलमान बहुतेक मूळचे अंत्यज जातींतून मुसलमान झाले असावे, आणि म्हणूनच ह्यांनीं धर्मांतर केलें तरी इस्लामसारख्या एकांतिक धर्मांतहि ह्यांना हीन मानण्यांत येत असावें. हिंदुस्थान देशांत एकंदर मुसलमानांची संख्या ६,२४,५८,०७७ आहे व त्यांपैकी उत्तर हिंदुस्थानांत हीन मुसलमानांची संख्या ८६,२८,५६६ दाखविण्यांत आली आहे. पण ह्यांचा समावेश वरील अंत्यज संख्येंत करण्यांत आलेला नाहीं. कारण, हे मुसलमान असल्यानें ह्यांची स्थिति कितीहि हीन असली तरी हिंदु अंत्यजाइतकी ती असेल कीं काय, ह्याबद्दल शंका आहे. तथापि हिंदु जातिभेदाचा परिणाम कडकडीत मुसलमानी धर्मावरही कसा घडत आहे, ह्याचें वरील हीन मुसलमानांची संख्या हें एक चांगलें उदाहरण आहे. बलुचिस्थान व सरहद्दीवरील तुर्की -इराणी प्रदेशांतील सुलतानांमध्यें उत्तम, मध्यम व कनिष्ठ असा भेद केलेला दिसत नाहीं.  ह्याचे कारण, तेथील मुसलमानांमध्यें हिंदूंतून मुसलमान बनविलेल्यांची भेसळ क्वचितच झालेली आहे हें होय. तसेंच दक्षिणेंतील मुसलमानांमध्येंहि असा भेद केलेला नाहीं. ह्याचें कारण असें असावें कीं, इकडील हल्लींचे बहुतेक मुसलमान पूर्वींचे हिंदूच असलयानें असा भेद असणे शक्य नाहीं. मध्यंतरीं उत्तर हिंदुस्थानांतल्या मुसलमानांतच हा उच्चनीच भेद दिसून येणें शक्य आहे व तो तसा दाखविण्यांत आला आहे. ह्याप्रमाणें बलुचिस्थान व वायव्य सरहद्द आणि तसेंच नर्मदेच्या खालचें सर्व दक्षिण हिंदुस्थान इतका भाग वगळला असतां बाकी जो अस्सल उत्तर हिंदुस्थानचा भाग पंजाब, काश्मीर, राजपुताना, संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार, ओरिसा इत्यादी राहतो, त्यामध्यें मुसलमानांची एकंदर संख्या ४,७०,४८,५८१ आहे आणि त्यापैकीं ८६,२८,५६६ महणजे एक षष्ठांशाहून अधिक हीन मानलेले मुसलमान आहेत. तथापि ह्यांची गणना अंत्यजांत केलेली नाहीं, हे वर सांगितलेंच आहे.

अंत्यज आणि एकूण हिंदूंची प्रांतनिहाय संख्या (PDF साठी येथे क्लिक करा)

ज्यांचें वर्गीकरण करतां आलें नाहीं व जे अर्धवट रानटी स्थितींत आहेत; अशा हिंदु लोकांची संख्या ह्याशिवाय आहे. ती धरली असतां एकूण हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ इतकी होते.

हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांतील एकूण हिंदुसंख्येमध्यें अति उच्च मानलेल्या व अति नीच मानलेल्या जातींचें दर शेंकडा प्रमाण खालीं दिल्याप्रमाणें आढळून येतें.

तक्ता १ - (PDF साठी येथे क्लिक करा)
अत्यंज अथवा पंचम वर्गाच्या कांहीं मुख्य जातींची सर्व हिंदुस्थानांतील एकूण संख्या
तक्ता २ - (PDF साठी येथे क्लिक करा)

ह्या आंकड्यांवरून असें सिद्ध होतें कीं, हिंदु लोकांपैकीं एकचतुर्थांशापेक्षां अधिक संख्या हीन मानलेल्या अंत्यज जातीची आहे, व मुसलमान लोकांपैकीं जवळ जवळ एक सप्तमांश हीन मानलेल्या अर्जाल वर्गांची आहे. ह्या हीन मुसलमानांची संख्या विचारांत न घेतां नुसत्या हिंदु अंत्यजांची संख्या हिंदुस्थानांतील एकंदर लोकसंख्येशीं ताडून पाहिली तरी ती तिच्या एक षष्ठांशाहून अधिक भरते ! म्हणजे, प्रत्येक सहा हिंदी माणसांमध्ये (मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे अथवा रंगाचे असोत) एक अगदीं टाकाऊ-शिवून घेण्याला देखील अयोग्य मानलेला असा मनुष्यप्राणी सांपडतो !!!

पुढें काय ?

येथवर ह्या भारत देशानें आपल्याच एका भागावर कसा कडक बहिष्कार घातला आहे ?  ह्या बहिष्काराचा आतांपर्यंत काय परिणाम झाला आहे ? आणि हा बहिष्कृत झालेला ह्या देशाचा कितवा भाग आहे, याविषयीं विचार झाला. आतां पुढें काय करावयाचें व त्यासंबंधीं हल्लीं काय चाललें आहे याचा विचार करण्यापूर्वीं या गोष्टी संबंधीं एकदोन आगंतुक मुद्द्यांचा विचार करणें अवश्य आहे.

इंग्रजी अमलांतील स्थिति

इंग्रजी या शब्दानें आमच्या देशांतील इंग्रज सरकार आणि पाश्चात्य आधुनिक सुधारणा या दोन्हींचा अंमल दर्शित करण्यांत येतो. एका पिढीच्या मागें इंग्रज सरकार म्हणजे माबाप सरकार (Parental Government) अशी तत्कालीन समजुतदार माणसाची कल्पना होती. इंग्रज सरकार हें शहाणें आणि जबरदस्त आहे आणि त्याच्यापासून हिंदुस्थानचें हित बरेंच झालें आहे आणि पुढेंही होण्याची आशा अद्यापि नष्ट झाली नाहीं, असें पुष्कळ समजुतदार माणसांना अद्यापिही वाटत आहे. हल्लीं युगांतर झपाट्यानें होत असल्यामुळें या कल्पनेस प्रस्तुत काळीं बराच आळा बसला आहे. आणि हें योग्यच आहे. कारण, आईबापांची कामगिरी सरकारी रीतीनें मागें कधींच झाली नाहीं आणि पुढें होईल अशी आशा करणें मनुष्यजातीला शोभत नाहीं. म्हणून इंग्रज सरकारला ते माबाप नाहींत म्हणून दोष देणाऱ्या माणसांत मुळीं माणुसपणाच कमी आहे, असें म्हणणें फारसें वावगें होणार नाही. इंग्रज लोक या देशांत केवळ आधुनिक सुधारणेचा अंमल गाजविण्याकरितां जरी आले नाहींत - माबापगिरी बाजूला राहिली - तरी पर्यायानें त्यांच्यामुळें सुधारणेचा हितकारक अंमल बसत चालला आहे, हें त्यांच्या शत्रूंसही कबूल करावें लागेल. इंग्रजी राज्य आणि आधुनिक सुधारणा ह्यांचें प्रस्तुत विषयाला अनुलक्षून पाहतां एक प्रकारें ऐक्य आहे, असें दिसून येईल.

आतां अलीकडे इंग्रजी राज्यांत आणि सुधारलेल्या मनूंत ह्या बहिष्काराचा कडकपणा पुष्कळ कमी झाला आहे की काय, असा सहजच प्रश्न उत्पन्न होतो. ह्या मध्यंतरींच्या दीर्घ काळांत ह्यांची कडक अंमलबजावणी झाली आहे, ह्याला पुष्कळ दाखले सांपडतील, पण हल्लीं इंग्रजीच्या महात्म्यानें हा कडकपणा बऱ्याच ठिकाणीं कांहीं अंशीं कमी झाला आहे; ही गोष्ट ह्या लोकांच्या अत्यंत कळकळीच्या कनवाळूसही कबूल करावी लागेल, आणि ह्याबद्दल त्याला आनंदहि वाटेल. तथापि, हल्लींच्या सर्व बाजूंनीं होणाऱ्या प्रगतीच्या मानानें व इंग्रज सरकारच्या सत्तेच्या, संपत्तीच्या आणि शहाणपणाच्या मानानें पाहतां ह्या लोकांची आज जी दाद लागत आहे, ती फारच अल्प होय, असें म्हटल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. मिठावरचा आणि जमिनीवरचा कर, जकात आणि दुसऱ्या अशाच सर्वसाधारण करांची वसुली करते वेळीं सरकार अमूक जाति उच्च आणि अमुक जाति नीच हा भेद पाहत नाहीं; पण असें असूनही न्याकोर्टे, दवाखाने, शाळा, पोस्ट ऑफिसें इत्यादि सार्वजनिक जागीं नीच मानलेल्या वर्गांस उच्च म्हणविणारांच्या दृष्टीनें वागविण्यांत येतें, त्यामुळें ह्या आधींच रंजलेल्या बापड्यांस अनेक अपमान, अडचणी आणि पुष्कळ वेळां अन्यायही सोसावे लागतात. कर घेतेवेळीं सरकार जी समदृष्टी ठेवितें ती प्रजापालनाचे वेळीं का ठेवित नाहीं ?  ती ठेवणें जर कांहीं राजकीय धोरणामुळे अशक्य किंवा अनिष्ट असेल, तर कर घेण्यांतहि तशीच विशेष सूट असावयाला नको होती काय ?  असो; ह्या बाबतीत सरकारचा कदाचित फारसा दोष नसेल. आपल्या राज्यांत सर्वांना सारखे हक्क आहेत असें सरकारने जाहीर केले आहे व तशी त्याची इच्छा आहे व प्रयत्नहि आहेत. पण ह्या जाहीर इच्छेची अखेरची अंमलबजावणी आमच्या लोकांवरच अवलंबून असल्यामुळें सरकार केव्हां केव्हां अगदी पंगू बनून जाते. तथापि, सरकारचा फार नसला तरी थोडा तरी दोष आहेच. लोकांच्या धर्मसमजुतींत हात घालावयाचा नाहीं, हें सरकारचें धोरण जरी फार इष्ट आणि अवश्य आहे, तरी प्रजेपैकीं कांहीं वर्गांच्या धर्मसमजुती, सार्वजनिक शांतता, वगैरे सबबींवरून एखाद्या वर्गाच्या उपजत हक्कांची पायमल्ली होते तेव्हां सरकारानें तिकडे कानाडोळा करणें म्हणजे आपल्या प्रजापालनाच्या कर्तव्यास अंशतः तरी चुकणेंच होय. वऱ्हाडप्रांतांत अंत्यज मुलांस शाळांतून इतरांबरोबर बसविण्यांत येतें; इतकेंच नव्हे, तर सरकारी नोकरींतहि ह्या जातींपैकीं थोड्यांचा शिरकाव झाला आहे, ही गोष्ट खरी आहे, आणि ती तेथील सरकारी अंमलदार आणि उच्च वर्ग ह्या दोघांनांहि भूषणावह आहे. तथापि इतर प्रांतांत मोठमोठ्या शहरांतूनहि याच्या अगदी उलट प्रकार राजरोस चालू आहेत ! सरकारच्या तगाद्यामुळे म्युनिसिपालिट्यांनी मोठमोठ्या गांवीं अंत्यजांसाठीं वेगळ्या शाळा काढिल्या आहेत; पण अत्यंत शाळेकरितां चांगले हुशार मास्तर नेमण्यासंबंधीं म्युनिसिपल बोर्डांकडून फारच थोडी काळजी घेण्यांत येते. एखादी धर्मार्थ शाळा उघडली कीं, आपलें कर्तव्य आटोपलें, असें बोर्डास वाटतें. शाळा कोठें तरी दूर कोपऱ्यांत असावयाची, तेथें एक अर्धवट शिकलेला मुसलमान मास्तर ठेवावयाचा - आणि असा जुलमाचा रामराम करून वेगळें व्हावयाचें !

सरकारी नोकरीसंबंधीहि या लोकांवरचा बहिष्कार वऱ्हाड प्रांताबाहेर जशाचा तसाच आहे. मागे लष्करखात्यांत या लोकांची चांगली बढती होत असल्यामुळें यांच्यांत काहीं चांगली पेन्शनर मंडळी अद्याप आढळते; पण १८९२ सालापासून ह्या बाबतींतहि कांही अकल्पित धाड आल्यामुळें ह्यांची पीच्छेहाट होत आहे. ह्या नोकरीच्या बाबतींत आपलेच लोक आपल्या ह्या दीन देशबांधवांस कसे खाली रगडीत आहेत, हें खालील गोष्टींवरून कळण्यासारखें आहे.

मंगळूर येथें तेथील ब्राह्मसमाजाच्या सेक्रेटरींनीं पंचम लोकांकरितां एक शाळा काढिली आहे. त्या शाळेंत शिकून तयार झालेल्या विद्यार्थ्यांना कोठेतरी चांगली नोकरी मिळवून देण्याकरितां हे गृहस्थ फार झटत असतात. त्यांच्याकडून आलेल्या एका खासगी पत्रांत पुढील मजकूर आहे :

''मीं किती खटपट केली तरी एकाहि विद्यार्थ्यांस नोकरी मिळवून देतां आली नाहीं !  शेवटीं एका भल्या युरोपियन डिस्ट्रिक्ट जज्जांनीं पुढें जी चपराशाची जागा रिकामी होईल ती पंचमास द्यावी, असा ठराव केला. जागा रिकामी होऊन एका पंचमाचा अर्ज गेल्याबरोबर त्या सर्व खात्यांतील सुमारें १०० शिपाई मिळून जज्जसाहेबांच्या बंगल्यावर जाऊन आडवे पडले आणि मेहेरबानांनी पंचमाला नोकरीवर घेऊन आपल्यास हिणवूं नये; अशी मागणी इतक्या नेटानें केली, कीं शेवटीं मेहेरबानांस ती मान्य करावीच लागली !''

ह्या बाबतींत जो अन्याय घडला तो स्वदेशी कीं परदेशी, ह्याचा निर्णय वाचकांनींच
करावा  !मुळीं अन्यायच घडला नाहीं, असा निर्णय करणारे वाचक भेटल्यास लेखकाचें नशीब म्हणावयाचें !!

असो. बहिष्काराचे ह्यापेक्षांही खडतर मासले नित्य आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहेत; आणि त्रावणकोरसारख्या अगदीं सुधारलेल्या संस्थानांत देखील ह्या लोकांची जी अपेष्टा चाललेली सर्वांच्या ऐकण्यांत येते, तीवरून आधुनिक सुधारणेच्या मानानें आमचें पाऊल ह्या बहिष्काराच्या बाबतींत अद्यापि फारच मागें आहे, असें कष्टानें कबूल करावें लागते.

ख्रिस्ती पंथ

व्यवहारांत धर्मांच्या नावानें जितक्या चुका झाल्या आहेत व होत आहेत तितक्या कशानेंच झाल्या नसतील ! केवळ व्यवहारांतच नव्हे, तर भाषेंतही तितक्याच चुका होतात. खरे पाहूं जाता धर्म एकच आहे आणि हिंदु, मुसलमानी, ख्रिस्ती इत्यादी केवळ त्याचे पंथ होत. असें असतां, हे सर्व पंथ निरनिराळे धर्मच मानण्यांत आल्यामुळें त्या परस्परांतील तेढी अत्यंत तीव्र झालेली आहे. मनुष्यप्राण्याला स्वभावसिद्ध असलेली ही धर्मप्रवृत्ती ह्या सर्वच पंथांत निरनिराळ्या रूपानें व कमी-अधिक शुद्ध स्थितींत प्रगट होत आहे. ही धर्मवृत्तीच कायती शाश्वत आणि हे सर्व पंथ देशकालमानाप्रमाणें बदलत जाणारे आहेत, हें इतिहासावरून उघड दिसत असतांहि ख्रिस्त्यांना असें वाटतें कीं, ख्रिस्ती धर्मच काय तो सार्वत्रिक धर्म  -Universal Religion - आणि हिंदूंनी तर आपल्या धर्माला 'सनातन' हे नांव कधींच दिलेलें आहे !

धर्म आणि त्याचे पंथ यांविषयी वरील शुद्ध आणि निरपेक्ष सत्य ध्यानांत ठेवून ख्रिस्ती पंथानें प्रस्तुत विषयासंबंधीं जी कामगिरी बजाविली आहे, तिचा थोडक्यांत कृतज्ञपणानें पण निर्भीडपणें विचार करूं या. हे आमचे विचार ख्रिस्ती, हिंदु, ख्रिस्ती झालेले किंवा हिंदूच राहिलेले अस्पृश्यवर्ग ह्यापैकीं पुष्कळांना पटणार नाहींत, हें आम्ही जाणून आहों; पण त्याला इलाज नाहीं. हिंदुपंथाने हीन समजून टाकून दिलेल्या ह्या जातींचा ख्रिस्ती पंथाने जो आजवर परामर्श घेतला आहे व त्याची अंशतः तरी उन्नति केली आहे, त्याबद्दल ह्या पंथाचे जितके धन्यवाद गावे तितके थोडेच आहेत. या बाबतींत ख्रिस्ती मिशनरी केवळ परोपकारबुद्धीनें काम न करितां ह्या गरीब लोकांना आपल्या कळपांत ओढण्याचा त्यांचा कावा असतो; असा जो कांहींसा आक्षेप असतो, त्यांतही विशेष अर्थ नाही. ख्रिस्ती मंडळीला जर आपला पंथ चांगला वाटतो, तर त्यांत दुसऱ्यांनीं यावें असा त्यांनीं प्रयत्न करणें हेंच त्यांच्या ख्रिस्तीपणाला शोभते. उलट, ज्या हिंदूला ह्या गरीब जाती आपल्या धर्मांत राहिल्या काय अथवा गेल्या काय सारख्याच वाटतात, आणि ह्या लोकांनीं हिंदुधर्मांत असे तोंपर्यंत मात्र दूर रहावें आणि ख्रिस्ती होऊन पोषाख बदलून जवळ आल्यास हरकत नाहीं, असें वाटतें, त्यांच्या उदासीनपणाला व विसंगतपणाला दुसऱ्या कशाचीहि उपमा दिसत नाहीं  !

पण मुख्य प्रश्न बाजूलाच राहिला आहे. तो हा कीं, जवळ जवळ ५॥ कोटी प्रजेनें अशा हीन स्थितींत राहून चालेल काय ? हिंदुपंथ तर आपला सोंवळेपणा सोडावयाला तयार नाही, आणि तो सोंवळेपणा कायम आहे तोंपर्यंत या जातीला पुढें सरकावयाला जागा नाहीं. तर मग हें व्हावें कसें ?  इतक्या सगळ्यांनी एकदम ख्रिस्ती व्हावें ? यक्षिणीची कांडी फिरवून इतक्या लोकसमुदायाला कोणी एकदम ख्रिस्ती करील म्हणावें तर तेंही संभवनीय नाहीं. तथापि हिंदु लोकांची उदासीनता व विसंगतता शाश्वत राहिली, तर मात्र वरील चमत्कारही घडण्याचा संभव आहे. असा प्रकार खरोखरीच घडून आला तर राष्ट्रीय दृष्ट्या काय प्रकार होईल पहा. हल्लीं भारतीय साम्राज्यांत खालील प्रमाणें लोकसंख्या आहे.

(इतर १५ + हीन ५॥ मिळून) २१ कोटी हिंदु. (इतर ५ + हीन १ मिळून) ६ कोटी मुसलमान. ३० लक्ष ख्रिस्ती. १ कोटी जंगली. १ कोटी बुद्ध, जैन, शीख वगैरे.

हिंदुपंथाची उदासीनता आणि ख्रिस्ती पंथाची चळवळ आतांप्रमाणेंच कायम राहील तर पुढें  खाली दिल्याप्रमाणें गणना होण्याचा संभव आहे :

१५ कोटी हिंदु, ६ कोटी मुसलमान.  ७ कोटी ख्रिस्ती.  १ कोटी बुद्ध, जैन, शीख व.  म्हणजे राष्ट्रीयदृष्ट्या आतां जी हिंदुमुसलमानांची दुही आहे, तिच्याऐवजीं वरील प्रकार घडलाच तर हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती यांचा तिरपगडा होणार !  १५ कोटी मवाळ हिंदु आणि जवळजवळ तितकेच कडवे मुसलमान आणि ख्रिस्ती मिळून या तिघांचे सूत कसें जमणार ईश्वर जाणे !

यावर कांहीं ख्रिस्ती मंडळीचें म्हणणें असें पडतें कीं, ५॥ कोटी हीन दशेंतल्या महारमांगांचें व त्यांना दूर दूर ठेवणाऱ्या १५ कोटी इतर हिंदूंचे आतां तरी कोठें सूत जमत आहे ?  हे ५॥ कोटी महारमांग ख्रिस्ती होऊन सुशिक्षित आणि सुखवस्तु झाल्यानें राष्ट्राचें पाऊल मागें पडण्यापेक्षां पुढेंच पडणार नाहीं कशावरून ?  इतके लोक ख्रिस्ती झाल्यावर ते ह्या देशांतलेच कायमचे राहणारे असल्यानें इतर हिंदूंशीं ते राष्ट्रीय बाबतींत विरोधानेंच वागतील कशावरून ? दुसऱ्या पक्षीं, कांहीं जुन्या मताच्या आणि तटस्थ वृत्तीच्या हिंदु मंडळींचें असें म्हणणें पडतें कीं, वरिष्ठ हिंदु कितीहि उदासीन राहिले तरी हीन मानलेले लोक कालांतरानें आपली आपणच सुधारणा करून घेऊन एक वेगळी जात बनवून सुखानें रहाणार नाहींत कशावरून ? मग त्यांच्या उद्धारासाठीं एवढा खटाटोप कशाला हवा आहे ?

हिंदूंचा उदासीनपणा कायम धरून चार प्रकारचे परिणाम संभवतात. (१) हे ५॥ कोटी लोक अशाच स्थितींत राहतील, किंवा (२) आपणच आपला उद्धार करून नवी जात बनवीतील, किंवा (३) ख्रिस्ती होऊन हिंदूंशीं विरोधानें वागतील किंवा (४) धर्म बदलला तरी राष्ट्रीय बाबतींत सलोख्यानें वागतील.  पण हे चारी प्रकार हिंदुस्थानांतील कोणाहि बाणेदार, प्रगमनशील हिंदूला समाधानकारक वाटणार नाहींत. हिंदुस्थानांतील जातिभेद हिंदी राष्ट्राला घातक आहे, हें आतां इतके दिवस सामाजिक प्रगतीच्या उलट असलेलीं 'काळ', 'भाला', 'केसरी' सारखीं पत्रेंहि कंठरवानें सांगूं लागलीं आहेत ! हिंदूंच्या तटस्थपणाचा आता बहुतेकांला बाट येऊन चुकला आहे. ह्या ५॥ कोटी प्राण्यांचा उद्धार होऊन हे भावी हिंदी समाजांत व हिंदी साम्राज्यांत एकजीव होऊन जावे, अशी सर्वांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे. पण ही संजीवनी देणारा द्रोणागिरी कोणीं उचलून आणावा, हाच प्रश्न आहे. हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान इत्यादि पंथांचे जुनाट आणि जाड कवच फोडून धर्मप्रवृत्तीचा नवीनच एक अंकुर बाहेर आला पाहिजे. धर्मसंचाराशिवाय केवळ स्वार्थी आणि हिशोबी प्रवृत्तीच्या जोरावर हें काम होण्यासारखें नाही. आणि धर्माची प्रेरणा झाली तरी ती पंथाची जाड भिंत फोडण्याइतकी बळकट नसेल तर आंतल्याआंतच विरून जाण्याचा संभव आहे. ही भिंत फोडून कांही नवीन अंकुर ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज ह्यांच्या रूपानें ह्या देशांत वर येऊ लागले आहेत. त्यांच्यांत अंतरींचे बल किती आहे हें पाहण्याची कसोटी प्रस्तुत विषयांत आहे.

विचार करतां करतां आपण प्रेरणेच्या प्रदेशांत येऊन पोहोंचलों. या प्रदेशांत आपल्या दृष्टीस काय काय पडत आहे, या हीन-दीन लोकांच्या उद्धारासाठीं आपल्या लोकांचे कसकसे प्रयत्न चालले आहेत व ते कितपत सफल झाले आहेत अगर होण्याचा संभव आहे, याचा विचार पुढील भागीं करूं.