1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

गैरसमजाचा ससेमिरा

साऊथबरो कमिटीपुढे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यवर्गीयांच्या प्रतिनिधित्वासंबंधी जी साक्ष दिली तिच्याबद्दलचे एक वेगळेच विपर्यस्त प्रसृत होऊन त्यांच्या हेतूबद्दलच अनाठायी शंका घेतली गेली. त्यामुले जो गैसमज १९१९ सालच्या प्रारंभा निर्माण झाला, तो ऐंशी वर्षांनंतर ब-याच प्रमाणात अजूनही टिकून आहे. ही बाब व्यक्तिगतरीत्या शिंदे यांच्यावर जशी अन्याय करणारी म्हणून दुदैवी आहे, त्याचप्रमाणे सामाजिक इतिहास यथार्थ स्वरूपात कळण्याला अडथळा निर्माण करणारीही आहे. ज्यांनी अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी अपूर्व स्तार्थत्याग करून अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी जिवापाड श्रम करून भारतभर या प्रश्नाबद्दल अपूर्व अशी जागृती केली, तेच जणू काय अस्पृश्यवर्गाचे हितशत्रू आहेत असा एक बोभाटा निर्माण करण्यात आला व ह्याबाबतची वस्तुस्थिती काय आहे याची शहानिशा न करता शिंदे यांच्याबद्दलचा गैरसमजच पाऊण शतकापेक्षाही अधिक काळपर्यंत टिकवून धरून तो जोपासला गेला, ही खरोखरच महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील दुरैवी घटना म्हणावी लागेल. ‘आत्मसमर्थन’ करणे हा ज्यांना ‘भार’१ वाटत असे त्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्यावरील अन्य आरोपांचे जसे खंडन केले नाही तसेच ह्याबाबतीत निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या भरीसही ते पडले नाहीत. शिंदे यांच्याबद्दल गैरसमज असणारे काही विचारवंत व लेखक हे तर शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना बाळगणारे आहेत. तेव्हा ह्या गैरसमजाची परंपरा शोधून त्याचा मागोवा घेणे उद्वोधक ठरेल असे वाटते.


आपण आधी बघितल्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे यांची जी साक्ष झाली, त्याच दिवशी डॉ. आंबेडकरांचीही साक्ष झाली. कमिटीला आधी दिलेल्या लेखी निवेदनात आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनच्या संदर्भात आक्षेप घेताना असे म्हटले आहे की, “अस्पृश्यवर्गाच्या प्रतिनिधित्वाच्या विरोधात डिप्रेस्ड क्लास मिशनच्या वतीने दुसरी एक योजना पुढे आणण्यात येत आहे. ही योजना स्वीकृतीची (को-ऑप्शनची) योजना म्हणून ओळखण्यात येते. कायदेमंडळात निवडून आलेल्या स्पृश्य प्रतिनिधींनी अस्पृश्यवर्गीय प्रतिनिधी निवडणे असे तिचे स्वरूप असून अस्पृश्यवर्ग हा चिरंतन काळपर्यंत पददलित राहील; अशीच ह्या योजनेमुळे करण्यात आली आहे” असे ह्या लेखी साक्षीत आंबेडकरांनी नमूद केले आहे.२


फ्रंच्याइज कमिटीकडे अनेक संस्थांची जी निवेदने आलेली होती ती कमिटीच्या पहिल्या खंडात एकत्रित केलेली आहेत. त्यामध्ये डी. सी. मिशनच्या वतीने सादर केलेले कोणतेही निवेदन नाही. मिशनचे अध्यक्ष चंदावरकर आणि जनरल सेक्रेटरी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाच्या राजकीय जागृतीबाबत अनेक सभा वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या. परंतु त्यामध्येही अशा प्रकारच्या डी. सी. मिशनच्या निवेदनाचा निर्देश नाही की, अशा योजनेचा पुरस्कार केल्याचे दिसून येत नाही. आंबेडकरांनीही आपल्या लेखी साक्षीत नेमकेपणाने मिशनचे ही योजना सादर केलेली आहे, असेही म्हटले नाही; तर केवळ अशी योजना मिशनच्या वतीने अलीकडे ‘पुढे आणण्यात येत आहे’ असे मोघम विधान केले आहे. कदाचित आंबेडकरांनी हे विधान चुकीच्या ऐकीव माहितीवर केलेले असणे शक्य आहे. परंतु त्यांनी ह्या मुद्द्यांवरून कमिशनपुढे लेखी दिलेल्या निवेदनात मिशनवर जोरदार हल्ला केला व डी. सी. मिशन हे अस्पृश्यवर्गाचे खरेखुरे हितकर्ते नाहीत, तर अस्पृश्यवर्गाला कायम स्पृश्यांच्या पारतंत्र्यात ठेवण्याचा त्यांचा इरादा आहे, असेच कमिटीला पटविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.


मिशनने असे कोणतेही निवेदन दिलेले नाही याचा अंतर्गत पुरावा शिंदे यांच्या लेखी तसेच तोंडी साक्षीत मिळतो. शिंदे यांच्या लेखी साक्षीत तर अस्पृश्यवर्गासाठी स्वतंत्र राखीव मतदारसंघ असावेत; त्यांना पाच जागा देण्यात याव्यात व मतदान-पात्रतेच्या अटी त्यांच्याबाबत शिथिल कराव्यात अशी मागणी केली असल्याचे आपण पाहिले. त्यामध्ये स्वीकृतीच्या पद्धतीचा दुरूनसुद्धा निर्देश नाही. कमिटीने शिंदे यांना प्रत्यक्ष साक्षीला बोलावले. कमिटीला त्यांच्या भूमिकेत कोठेही विसंगती आढळली नाही. त्यांच्या विसंगत भूमिकेचा कुठेही उल्लेख कमिटीने केला नाही, अथवा त्यांना याबाबत प्रश्नही विचारला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, मिशनच्या वतीने अशा प्रकारची कोणतीही योजना लेखी निवेदनात नमूद केलेली नव्हती, वा प्रत्यक्ष साक्षीत अशा तरतुदीची मागणी केलेली नव्हती. मिशनच्या वतीने वेगळे निवेदन केले व शिंदे यांनी व्यक्तिगत भूमिकेवरून वेगळे निवेदन केले असाही भाग नव्हता. शिंदे यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांची जी तपासणी केली तिच्या वृत्तान्तात कमिटीने हे स्पष्ट नमूद केले आहे. “ते ब्राह्मसमाजाचे मिशनरी व डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे जनरल सेक्रेटरी होते. कमिटीपुढे ते जे उपस्थित राहिले ते प्रामुख्याने अस्पृश्यवर्गाच्या मागण्यांवर भर देण्यासाठी.” यापुढे कमिटीने नमूद केले आहे, “त्यांच्या लेखी निवेदनात स्वतःचा दृष्टिकोण, त्याचप्रमाणे प्रामुख्याने मिशनचा दृष्टिकोण प्रतिबिंबित झाला आहे.”३ यावरून हे स्पष्ट आहे की शिंदे यांनी दिलेले निवेदन केवळ मिशनच्या वतीने साऊथबरो कमिटीला देण्यात आले नव्हते व शिंदे यांच्या लेखी निवेदनात तसेच तोंडी साक्षीत डॉ. आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे स्वीकृतीच्या योजनेचा उल्लेखही केलेला नाही. म्हणजे डॉ. आंबेडकरांनी मिशनवर व पर्यायाने शिंदे यांच्यावर स्वीकृतीच्या योजनेचा उल्लेखही केलेला नाही. म्हणजे डी. आंबेडकरांनी मिशनवर व पर्यायाने शिंदे यांच्यावर स्वीकृतीपद्धतीने अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडण्याच्या संदर्भात आक्षेप घेऊन जी टीका केली ती सर्वस्वी निराधार होती. आंबेडकरांनी मिशनवर घेतलेला आक्षेप ऐकीव माहितीच्यापोटी अथवा एक प्रकारच्या आशंकेने घेतलेला असावा. शिंदे यांनी डी. सी. मिशनची स्थापना करून केलेले कार्य, अलीकडच्या काळातच मुंबईला श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली भरविलेल्या अस्पृश्यतानिवारक परिषदेचे प्रचंड स्वरूप व तिचा भारतव्यापी प्रभाव व एकंदरीतच अस्पृश्यतानिवारणकार्याच्या संदर्भात धुरीण म्हणून शिंदे यांचे जोडले जाणारे नाव यामुळे आंबेडकरांच्या मनात शिंदे यांच्याबद्दल काहीएक आशंका निर्माण झाली असावी असे वाटते. त्यांच्या आशंकेचे मूळ अस्पृश्यता व जातिमिर्मूलन ह्या प्रश्नाशी जोडलेले अस्पृश्यांचे राजकारण अस्पृश्य नेतृत्वाखालीच केले जावे या त्यांच्या धारणेत असणे स्वाभाविक होते. डॉ. आंबेडकरांचे समकालीन चरित्रकार चां. भ. खैरमोडे यांनी नमूद केले आहे, “१९१९चा राजकीय सुधारणा कायदा पास झाल्यानंतर कायदेमंडळातील अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आपली किंवा स्पृश्यवर्णीय सहका-याची निवड व्हावी म्हणून शिंदे सरकारदरबारी प्रयत्न करतील, तर तो प्रयत्न हाणून पाडावा याबद्दल आंबेडकरांनी आपल्या समाजसेवकांना आदेश दिला होता. त्याप्रमाणे अस्पृश्यवर्गीय पुढारी सभा भरवून तसे ठराव पास करून सरकारकडे पाठू लागले.”४ मिशनबद्दलचा आक्षेपही आपल्या लेखी निवेदनात डॉ. आंबेडकरांनी ह्या प्रकारच्या सभय आशंकेपोटी नोंदविला असला पाहिजे असे वाटते.


मिशनवर व पर्यायाने शिंदे यांच्यावर हल्ला चढविण्याचे डॉ. आंबेडकर यांनी ह्या आशंकेपटीच ठरविले असावे ह्याचा दुसरा पुरावा त्यांच्या ह्या साक्षीतच मिळतो. मार्च १९१८ मध्ये मुंबईत श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अस्पृश्यतानिवारक परिषदेचा उपहास करण्यासाठी व तिची किंमत कमी करण्याच्या हेतूने डॉ. आंबेडकरांनी आपल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, “ अस्पृश्यतानिवारण करण्यासाठी मार्च १९१८ मध्ये मुंबईत एका परिषदेच्या ‘फार्स’चा प्रयोग करण्यात आला. करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी हो कबूल करूनही परिषदेला न येता उत्तर हिंदुस्थानात काही निकडीच्या कामाकरिता म्हणून निघून गेले. मिस्टर टिळक यांनी परिषदेत छोटेखानी भाषण केले. परंतु त्यांचे सुदैव म्हणूनच त्याचा वृत्तान्त वृत्तपत्रात आला नाही. परंतु निव्वळ बोलण्यातच त्यांनी सहानुभूती दाखविली. अस्पृश्यता पाळणार नाही, अशा अर्थाच्या जाहीरनाम्यवर मात्र त्यांनी सही केली नाही.”५ परिषदेचा एकंदर कार्यभाग विचारात न घेता वैगुण्यस्वरूप दोन बाबींचा निर्देश तेवढा त्यांनी केला आहे.


अस्पृश्यतानिवारणाचे कार्य आपल्या संस्थानात मोठ्या निर्धाराने व दूरदृष्टीने करणा-या सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या तीन दिवसांच्या परिषदेचे वर्णन केवळ ‘फार्स’ म्हणून करणे हे वस्तुस्थितीला धरून नव्हते, हे कोणाच्याही सहज लक्षात येऊ शकते. यावरून एवढे एकच स्पष्ट होते की मिशनवर हल्ला करण्याचे आंबेडकरांनी पक्के ठरविले होते.


डॉ. आंबेडकर अमेरिकेहून भारतात परत आले त्या सुमाराला म्हणजे १९१६-१७ मध्ये अस्पृश्यवर्गाच्या चळवळीचे क्षेत्र वाढत होते. शिंदे, चंदावरकर ही मंडळी बदललेल्या वातावरणाचा लाभ घेऊन अस्पृश्यवर्गाची सैन्यामध्ये भरती करावी, या प्रकारच्या मागण्या करीत होती व त्यांच्या या प्रयत्नांना यशही येत होते. १९१६ सालीच अस्पृश्यांच्या लष्करभरतीवरील बंदी उठल्यानंतर अल्पावधीत महारांच्या दोन कंपन्या तयार झाल्या. अस्पृश्यवर्गाच्या हितासाठी त्यांना शिक्षणविषयक सवलती, सरकारी नोक-यांत प्रवेश इत्यादी मागण्या जोराने केल्या जाऊ लागल्या. त्याबरोबरच राजकीय हक्कासंबंधीही मागण्या होऊ लागल्या. आंबेडकरांचे समकालीन चरित्रकार चां. भ. खैरमोडे यांनी म्हटले आहे, “शिंद्यांच्या कार्यामुळे अस्पृश्य समाजात शिंदे व चंदावरकर यांचे प्राबल्य काही काळ चालू होते. एवढेच नव्हे तर अस्पृश्यांच्या हितासाठी कोणताही प्रश्न सरकारने विचारात घ्यावयाचा ठरविला तर सरकार चंदावरकर आणि शिंदे यांच्याशी सल्लामसलत करीत असत.” खैरमोडे पुढे लिहितात, “तथापि अस्पृश्याच्या चळवळीत खुद्द अस्पृश्य समाजसेवक स्वतंत्रपणे वावरत असत. पुढे पुढे तर चंदावरकर आणि शिंदे यांची गुलामगिरी त्यांना नकोशी वाटू लागली यासंबंधीचा इतिहास पुढे यथावकाश येईलच.”६ खैरमोडे यांचे हे निवेदन जसे शिंदे व चंदावरकर यांच्या कार्याबद्दल माहिती प्रकट करते, त्यांच्या प्रभावाचा निर्देश करते त्याचप्रमाणे आंबेडकरांच्या मनःस्थितीवरही प्रकाश टाकते, असे म्हणता येऊ शकेल.

Read more: गैरसमजाचा ससेमिरा

कौटुंबिक वातावरण

विठ्ठल रामजी शिंदे यांचे तत्त्वज्ञानात्मक स्वरुपाचे अथवा ललित स्वरुपाचे लेखन वाचले असता आपल्या मनावर ठसा उमटतो, तो त्यांच्या प्रेममय वृत्तीचा. 'मरण म्हणजे काय?' या प्रवचनामध्ये त्यांनी जगण्यासासखी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम होय असे सांगून जीवनात असणा-या प्रेम ह्या तत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. त्यांचे अंत:करण प्रेमपूरित होते. कौटुंबिक जीवनातही त्यांच्या प्रेममय वागण्याचा सातत्याने आविष्कार होत आलेला आहे. त्यांच्या या प्रेममय मनोवृत्तीमुळे त्यांच्या स्वत:च्या कौटुंबिक जीवनात प्रेमाचा सतत आविष्कार होत असे एव्हढेच नव्हे तर त्यांच्या इतरांशी होणा-या वर्तनातून त्यांची प्रेममय भावनिक वृत्तीच प्रकट होत असे.


त्यांच्या प्रेमाचा आविष्कार लहान मुलांबाबत तसाच वृद्धांबाबत, पुरुषांबाबत त्याचप्रमाणे स्त्रियांबाबत सातत्याने होत राहिला. त्यांची प्रेमभावना ही केवळ व्यक्तीपुरती कधीच मर्यादित राहिली नाही. त्यांच्या प्रेमभावनेला आविष्कार कौटुंबिक प्रेमभावना ही केवळ व्यक्तीपुरती कधीच मर्यादित राहिली नाही. त्यांच्या प्रेमभावनेला आविष्कार कौटुंबिक पातळीवर सातत्याने होत राहिला. तो कोणाही एका व्यक्तीचा, पुरुषाचा विचार करीत नसत. त्याच्या जोडीने त्याच्या पत्नीचा आणि अन्य कुटुंबीयांचा विचार करीत असत.

व्यक्तीचा विचार करीत नसत. त्याच्या जोडीने त्याच्या पत्नीचा आणि अन्य कुटुंबियांचा विचार करीत असत. व्यक्तीचा विचार करीत असतानाही तिच्या कुटुंबाचे पूर्वापार असलेले संबंध त्यांच्या मनात सहजच येत असत. नवा परिचय घडला की त्या परिचयाला ते कौटुंबिक स्नेहाचे स्वरुप प्राप्त करुन देत असत. प्रेमाचा व्यापक आविष्कार हा त्यांचा सहज स्वभाव होता.


विद्यार्थीदशेत जुळलेले स्नेहबंध हे विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी आयुष्यभर केवळ संभाळले एवढेच नव्हे तर ते जपले व अधिकाधिक उत्कट केले. तेरदाळचे विष्णु अण्णा देशपांडे हे त्यांचे लहानपणाचे जिवलग मित्र पुढील आयुष्याभरात जिवलग मित्रच राहिले आणि ही मैत्री केवळ या दोघांमधील नव्हती तर शिंदे व देशपांडे या कुटुंबांमधील होती. या मैत्रीची उत्कटता एवढी तीव्र होती की अत्यंत जिवलग नातलगाप्रमाणे विठ्ठल रामजी व विष्णुपंत यांच्यानतंरच्या पिढ्यांतही टिकून राहिली. विष्णुपंत देशपांडे यांच्या कन्या श्रीमती शकुंतलाबाई जगदग्नी ह्यांना भेटले असता ह्म दोन मित्रांमधील आणि दोन कुटुंबांमधील प्रेमाचे अत्यंत हृदयंगम वर्णन ऐकायला मिळत असे. शिंदे यांच्या प्रेमवृत्तीला तेरदाळकर देशपांडे कुटुंबीयांचा अनुरुप असा प्रतिसाद सदैव मिळत राहिला.


सार्वजनिक जीवनात व राजकीय कार्यामध्ये विष्णु अण्णा देशपांडे व विठ्ठल रामजी शिंदे यांचे सहकार्य कोणत्या प्रकारचे होते; तेरदाळ येथील संस्थांनी शेतकी परिषद ह्या दोघांच्या नेतृत्वाने कसी यशस्वीपणे पार पाडली; ह्यावरुन त्या दोघांच्या सार्वजनिक कार्यातील सहकार्याचे सोज्वळ स्वरुप आपण मागील एका प्रकरणात पाहिले आहेच. शिंदे व देशपांडे ह्या दोन कुटुंबाचे कौटुंबिक पातळीवर किती प्रेममय संबंध होते, याची कल्पना श्रीमती शकुंतलाबाई जगदग्नी यांच्या प्रांजळ निवेदनावरुन येऊ शकते. १९०१ ते १९०३ ह्या काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले होते. ह्या काळामध्ये सौ. रखमाबाईकाकींनी फार हाल सोसले याचे वर्णन शकुंतलाबाई करतात. कधी कधी प्रतापला दूध मिळत नसे. घरात वरचेवर गृहकलह होऊ लागे. त्यावेळी रखमाबाई विष्णुअण्णांच्या घरी येऊन राहत. शकुंतलाबाईंनी लिहिले आहे, "आमच्या आईने चार गोष्टी सांगून उपमन्यूलादेखील दूध मिळाले नाही. पीठ, पाणी मिसळून आई देत असे. विठू अण्णाचे कार्य फार मोठे आहे. श्रीरामचंद्राप्रमाणे कष्टी जीवन आहे. त्यांना साथ देऊन संसार करावा. त्यांचे तुमच्यावर फार फार प्रेम आहे. पण जनसेवेचे कंकण बांधले आहे. विश्वाचा संसार तोच त्यांचा संसार आहे. परदेशाला जाताना त्यांनी एक काव्य केले होते. त्यातच तुमच्यावरच्या प्रेमाचा अर्थ आहे. प्रथम तीव्रतेने त्यांना आपली आठवण झाली. 'तरुण भार्या तान्हे बालक, वृद्धही मातापिता, अनाथ भगिनी, बंधु धाकुटा, आश्रित बांधव सारे.' तरी आपण जगाचा संसार करावा. लगेच विठूअण्णा यावयाचे. सौ. रखमाबाई सासरी जावयाच्या."


विष्णुपंत देशपांड्यांची मोठी मुलगी म्हणजेच शकुंतलाबाईंची थोरली बहीण जमखंडीस शिनाप्पा नाईक अनिखिंडी यांचे थोरले चिरंजीव व्यंकटराव यांना दिली होती. प्लेगच्या दिवसांमध्ये माळावर झोपड्या बांधून राहिले असता एक वेळ अण्णासाहेब शिंदे माळावर त्यांच्याकडे राहावयास गेले होते. शकुंतलाबाईंची आई त्यांना सांगत असे की, शिंदेंना सकाळी न्याहरीला बाजरीची भाकरी, लसणीची चटणी, कांद्याचे पिठले लागत असे. सौ. बहिणाबाईंनी (विष्णुपंतांच्या पत्नी ) गरम भाकरी करुन देताच विठ्ठल रामजी विनोदाने म्हणत असत, "आधी पोटोबा मग विटोबा ही म्हण कोणी केली समजत नाही. वहिनी मात्र उलटे करते. आधी विठोबा मग सर्वांचा पोटोबा."


विष्णुपंत देशपांडे यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना जेवढी कळकळ व काळजी वाटत होती तेवढीच अण्णासाहेब शिंदे यांना वाटत होती. याबद्दलची एक उदबोधक आठवण दत्तो वामन पोतदार यांनी सांगितली आहे. ते म्हणतात, "विठ्ठलराव एवढे सुधारक ! पण एके दिवशी सकाळीच येऊन मला म्हणाले, " पोतदार, माझ्या एका मित्राच्या (विष्णुपंत देशपांडे) मुलीचे लग्न करावयाचे आहे, ऋग्वेदी ब्राह्मणातील एखादा चांगला मुलगा सांगा." जातिभेद न मानणारे, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वाहून ह्या कामासाठी त्या वर्गातच जाऊन राहणारे विठ्ठल रामजी शिंदे यांचे हे म्हणणे ऐकून दत्तो वामन पोतदार विलक्षण प्रभावित झाले. त्यांनी पुढे लिहिले आहे, "त्यांची ही निष्कपट मैत्री आणि मानसिक औदार्य पाहून मी स्तंभित झालो."


विष्णुपंत देशपांडे व विठ्ठल रामजी यांच्यामध्ये कोणत्या पातळीवरील समरसता होती ह्याची कल्पना एका विशेष प्रसंगाने येते. शेतक-यांवर होणा-या अन्यायाविरुद्ध अण्णासाहेब शिंदे, विष्णुपंत देशपांडे यांनी जोरदार मोहीम उघडली होती. १९३२ साली तेरदाळला सांगली संस्थान परिषदेचे अधिवेशनही बोलाविले. १९३० सालापासून शेतक-यांबद्दलचे त्यांचे प्रचारकार्य चालूच होते. "जमखंडीस हे प्रचारकार्य संपवून विठूअण्णा अनिखिंडी यांच्या घरी बारा वाजता आले. पाने वाढली. अण्णासाहेब आले म्हणून मेजवानीचा बेत होता.

 

विठूअण्णा व सर्व मंडळी पानावर जाऊन बसले. जेवावयास सुरुवात करणार तेवढ्यात विठूअण्णांनी चौकशी केली. विष्णू कोठे आहे? विष्णुअण्णांनी स्पष्टपणे सांगितले. सौ. पद्मावतीला मुलगा झाल्याशिवाय अनिखिंडी केली. विष्णू कोठे आहे? विष्णुअण्णांनी स्पष्टपणे सांगितले. सौ. पद्मावतीला मुलगा झाल्याशिवाय अनिखिंडी यांच्या घरी पाणी पिणार नाही" विठूअण्णाही पानावरुन ताडकन उठले. " अरे ! तुझी मुलगी पद्मावती माझी कुणीच नाही का? मी पण तिला मुलगा झाल्याशिवाय अनिखिंडी यांच्या घरी पाणी पिणार नाही." त्या वेळी तिच्या सासुबाईंनी करुणवाणीने पदर पसरुन एक घास तरी खाऊन जावा म्हणून विनवणी केली. "नाही म्हणजे नाही. नातू झाल्यानंतर येईन." असे वचन देऊन आम्ही सर्व मंडळी तेरदाळला आलो. सौ. रखमाबाईंना हकिकत सांगताच त्या म्हणाल्या. "बडोदेकर संस्थानात दिवाणाची नोकरी असताना नको म्हणून अन्नावर (जन्माच्या) लाथ मारली. एक दिवसाच्या जेवणाचे काय घेऊन बसलात. असेच हट्टी आहेत." वगैरे बोलून सौ. रखमाबाईकाकी गप्पा बसल्या. मग हळूच शिंदे आत येऊन बोलत, "बोलून झाले ना. आपण आता दुस-या विषयावर बोलूया."


विष्णुपंत देशपांडे व विठ्ठल रामजी यांनी १९३२ साली दक्षिणी शेतकरी परिषद तेरदाळला भरवून शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृत केली. "कर्मवीर शिंदे अध्यक्ष व विष्णुअण्णा स्वागताध्यक्ष होते. हरिहराची जोडी आम्ही नयनांनी पाहिली. डोळ्याचे पारणे फिटले." ह्या शब्दांतून शकुंतलाबाईंनी त्या दोघांबद्दल असलेली देवस्वरुप आदराची भावना प्रकट होते.


१९३१ साली म्हणजे लग्न झाल्यापासून १७-१८ वर्षांनी विष्णुपंतांची अनिखिंडीकडे दिलेली थोरली मुलगी पद्मावती ही प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. शिनाप्पा नाईक अनिखिंडी यांनी बारशाच्या निमित्ताने मोठा उत्सव केला. अण्णासाहेब शिंदे यांना मुद्दाम बोलावून घेतले होते. पद्मावतीच्या सासुबाई लक्षुंबाई ऊर्फ अव्वा वाढत होत्या. अण्णासाहेबांना वाढीत असताना त्या म्हणाल्या, "ऋषीमुनीसारखा आशीर्वाद दिला. नातू झाला. आपण आमचे घरी जेवावयास आलात. आनांद झाला." शकुंतलाबाई सांगतात, "त्यावर आमची आई म्हणाली, "ते साधे ऋषीमुनी नसून महर्षी आहेत. तेव्हापासून आम्ही कर्मवीरांना महर्षी म्हणू लागलो." ह्म दोन कुटुंबांमधील सहवासात आनंदाचे कितीतरी प्रसंग येऊन गेले.

देशपांडे कुटुंबीयांना अण्णासाहेबांच्या ऋषितुल्य प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल किती आदर होता याची कल्पना एका दु:खद प्रसंगाने येऊ शकते. १९४८ साली महात्मा गांधीच्या खुनानंतर तेरदाळला भयंकर जाळपोळ झाली. ब्राह्मणांची घरे जाळली. सर्व ह्यात विष्णुअण्णांनी जनसेवेत घालवली. पण त्या दिवशी लोक फार बेफाम झाले होते. एका घरात सहा माणसे जिवंत जाळली गेली. पंधरा-सोळा वाडे पेटलेले जळत होते. विष्णुअण्णा जळणा-या माणसांना वाचवतो म्हणून सैरावैरा धावू लागले. 'जगाच्या महात्म्याला-गांधीना-मारले. माझ्या जीवाची काय किंमत,' असे ते म्हणत होते. ह्या दिवशी त्यांच्या मनावर जो परिणाम झाला तो वर्षभर तसाच राहिला. १९४९ साली मे महिन्याच्या १६ तारखेस विष्णुअण्णांनी इहलोकाची यात्रा संपविली. विष्णुअण्णांच्या पत्नी बहिणाबाई यांना अतीव दु:ख झाले. त्या म्हणत, "विठूअण्णा असते तर असा प्रकार घडलाच नसता. ते धावून आले असते. जनमनाचा क्षोभ शमविला असता." दोन कुटुंबांत अपवादानेच आढळावा असा मित्रभाव शिंदे व देशपांडे कुटुंबात होता.


विठ्ठल रामजी शिंदे यांना लहान मुलांची अतिशय आवड होती. त्यांना मांडीवर खेळविणे, फिरायला घेऊन जाणे, त्यांच्याशी हास्यविनोद करणे ह्यांमध्ये ते फार रमत. लहान मुलाच्या वयानुरुप त्याला ते रमवीत असत सुलोचनाबाई सोमण ह्यांनी आपल्या 'अनुभव' या आत्मकथानामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्याला शाळकरी मूल असताना कसे मांडीवर घेतलं हे नमूद केले आहे. १९०३ साली ब्रिडपोर्ट येथे युनिटेरियन चर्चमध्ये उपासना चालविण्यास ते गेले होते. रेव्हरंड बेसिल शॉर्ट यांच्या सासुबाईंना शिंदे यांच्या भेटीची आठवण होती. त्यावेळी त्या अगदी लहान वयाच्या होत्या. शिंदे हे या वेळी चर्चमध्ये त्यांना भेटलो असता त्यांनी सांगितली.


अण्णासाहेबांना भारतामध्ये सतत प्रवास करावा लागत असे. प्रवासामध्ये आपल्या कुटुंबीयांची आठवण सदैव त्यांच्या मनात असे. प्रवासामध्य असताना ते कधी आपल्या वडिलांना, कधी पत्नी रुक्मिणीबाईंना. तर कधी भगिनी जनाबाईंना पत्रे पाठवीत असत. त्यांचे अंत:करणच कौटुंबिक जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले असे. पुतणी, मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या मनोविनोदनार्थ त्याचप्रमाणे त्यांना नवी माहिती मिळावी, त्यांच्यावर संस्कार व्हावेत या प्रकारचा हेतू ठेवून ते पत्रे लिहीत असत. ह्या पत्रातूनही त्यांचा विनोदी स्वभाव प्रकट होत असे. ह्या विनोदाच्या द्वारा जणू ते या लहान मुलांशी क्रीडा करीत असत. ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक कार्यक्रमानिमित्त ते कलकत्त्यास गेले असता त्यांनी आपला मुलगा रवींद्र व पुतणीला - बंधू एकनाथरावांची कन्या छबू हिला - पत्र लिहिले ते असे.


गुरुवार तारीख २३ ऑगस्ट १९२८
२१०-६, कॉर्नवॉलीस स्ट्रीट, कलकत्ता


प्रिय रवींद्र
आशीर्वाद
तारीख १६ रोजी मी येथे पोहोचलो. त्याच दिवशी मी प्रतापच्या नावे एक सविस्तर पत्र लिहिले. रा. सासने मजबरोबर आहेत. पण ते आजारी आहेत. त्यांना थोडे डहाळ जुलाब होतात. मला दोन दिवसांपूर्वी थोडी कणकण वाटली. पण आता मी अगदी बरा आहे.


काल उत्सवाचा मुख्य दिवस होता. सकाळी उपासना प्रसिद्ध कविवर्य डॉ. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी चालविली. त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते एक तास उशिरा आले. मी त्यांना प्रथमच पाहिले. ह्यांना नोबल प्राइज मिळवून ह्यांची चोहोकडे कीर्ती गाजत असता तू जन्मलास म्हणून तुझे नाव रविंद्र असे ठेवले. हे फार सुंदर गंभीर आणि भव्य आहेत. नाक सरळ, डोळे कमळासारखे पाणीदार आहेत, केस विपुल व दाढी शुभ्र आहे. दर्शनीय आहेत. ह्यांचे भाषण एक तास झाले. समाज अफाट जमला होता. पण चित्रासारखा तटस्थ होता. आवाज अलगुजासारखा मधुर कोमल आहे. भाषण झाल्यावर ह्यांनी थोडे गाऊन दाखवावे अशी नम्र विनंती करण्यात आली. किंचित मधूर स्मित करुन ही विनंती ह्यांनी मान्य केली व एक अतिगोड, स्वकृतपद म्हणून दाखविले. हे प्रसिद्ध गाणारे तज्ज्ञ आहेत. प्राचीन ऋषी किंबहुना एका देवतेप्रमाणे ह्यांचा देखावा प्रेरणा करणारा होता.


अंघोळीस वगैरे पाण्याची टंचाई आहे. हेमचंद्र अशक्त असूनही हिंडतात, फिरतातही. कोणीतरी हात धरून न्यावे लागते. शकुंतला दोन दिवस तापाने आजारी आहे. डोके, अंग दुखते तरी तशीच सर्व काम करीत आहे. मागे मी जेथे गेलो होतो, तेथील मरिहाटी व मशीहाटी येथील नामशूद्र मंडळी आली आहेत. ते तुझी व अक्काची फार आठवण करीत आहेत.


तुझा व छबूचा अभ्यास कसा आहे, ते दोघांनी स्वत: पत्रे लिहून कळवावे. माझी पत्रे असल्यास पाठवावीत. प्रतापने पाठविलेली तीनही पत्रे पोहचली. अक्काला घरी मदत करा. अभ्यास करा.
तुझा अण्णा.


प्रिय बाळ, प्रताप लिहितो की तू अभ्यास करीत नाही. स्वत: प्रतापने योग्य वेळी अभ्यास केला नाहीच म्हणून आता त्याला फार त्रास होत आहे. तूही तोच प्रकार चालविला आहे. पुढे पश्चाताप करण्यापेक्षा आताच अभ्यास कर.
तुझा अण्णा
छबूला पत्र वाचावयास दे. हे पत्र प्रतापास व त्यांचे त्यास ताबडतोब दे. अक्काला वाचून दाखीव.


३१ ऑगस्ट १९२८
२१०/६, कॉर्नवॉलीस स्ट्रीट, कलकत्ता


प्रिय रवींद्र व प्रिय छबू
आशीर्वाद
तेथील उत्सव आटपून चार दिवस झाले. उत्सवात गर्दी फार होती. पण कलकत्त्यास पाण्याचा तुटवडा आल्याने अंघोळीची व धुण्याची फार आबाळ झाली. खादीचे कपडे काळे होतात. साबण होता पण पाणी नव्हते. दोन दिवसांनी एकदा सा-या दोन बारड्या मला मिळत. तेही मी एका मोठा प्रचारक म्हणून. एका बारडीत धोतर, सदरे धुवावे लागत व दुस-यात स्नान करावे लागत असे. पण जपून केल्यास मला एवढे पाणी पुरत असे व माझे कपडे स्वच्छ आहेत. तुला सनाळची पुढची कृष्णा नदीही पुरत नाही. बबन तर गंगा नदीवर बसून अंघोळ करणार नाही. मी अर्ध्या बारडीत कपडे धुतो व बाकीचे अर्ध्या बारडीत ते स्वच्छ खळबळून बारडीतच पिळतो. ते पाणी फार घाण नसते म्हणून त्यातच बेंबीपासून खालच्या अंगाचा खालचा भाग प्रथम धुतो नंतर दुसरी स्वच्छ बारडी मला चांगली पुरते. काटकसर केल्यास केव्हाही वाण पडत नाही. धन मिळविण्यात सुख नसून ते फार जपून खर्च करण्यात आहे. लोक चिक्कू म्हणाल्यास त्यात पुन्हा करमणूक आहेच.


माझे डोक्यावर घेण्याचे दोन्ही रुमाल मधे फाटले आहेत इतकी भगदाडे पडली आहेत की त्यातून तू सहज छत्री घेऊन जाशील. ह्या भगदाडामुळे माझी मोठी सोय झाली आहे ! त्या भगदाडात माझा उजवा हात घालून रुमाल खांद्यावर घेतला की अंग चांगले झाकले व उजवा हा मोकळा राहतो. रुमाल फाटले नसते तर माझी ही सोय झाली नसती. कसलीही आपत्ती आली तर तिच्यातून सुखच बाहेर निघते. मात्र पाहणा-यास तशी दृष्टी पाहिजे. मी माझ्या फाटक्या रुमालाची सोय येथील मित्राला समजावून सांगितल्यावर सर्वत्र आनंदाचे हासे उचंबळले.


मला म्हणून दिलेल्या खोलीत एका मागून एक चार अधिक पाहुणे घुसले. सगळे रा. सासन्यासारखे जवळचे नको कसे म्हणावे, पण झाडणारा मी एकटाच. डॉ. खांडवाला वृद्ध सज्जन; परंतु बूट घालून सतरंजीवर फिरे. पुन्हा विसरे, इशारा दिला की भला गृहस्थ माफी मागे. मी झाडू कुठे व तुम्हाला माफी कुठे करु म्हटल्यावर सर्वत्र हाशा पिके. उत्सव संपल्यावर आमच्या खोलीतील मोठी सतरंजी भाड्याने आणलेली परत नेण्यास बाबू सतीशचंद्र चक्रवर्ती आले व मोठ्या मिनतवारीने नेण्याबद्दल क्षमा मागू लागले. मी म्हटलें, "अहो ही सतरंजी नेण्याबद्दल मीच तुमचे आभार मानितो. ज्याने त्याने बूट-जोडे घालून फिरावे व नंतर प्रार्थनेस जाऊन बसावे. मी मात्र सतरंजी झाडीतच मागे राहावे. आता पुन्हा न आणाल तर मला प्रार्थनेला वेळ मिळेल."


बंगाली लोक उपासनेला बसले तर इतका वेळ बसतात की इतकेड एकदा जन्मून मेला तरी त्यांना खबर नसते. अशा उपासना रोज दोन-तीन होतात. मध्यंतरी भजन चालते. असा आठ दिवस उत्सव चालला. मी ह्यातून जगून वाचून राहिलो म्हणून ईश्वराचे आभार मानण्यासाठी एक विशेष प्रार्थना करुन तिला सर्व बंगाल्यांना बोलावणार आहे. अक्का आली नाही तरी तू ये.
तुझा अण्णा


ह्याच दिवशी चिरंजीव छबूला अण्णासाहेबांनी आपल्या प्रवासाची कल्पना देणारे दुसरे पत्र लिहिले. अर्थात छबूला लिहिले असले तरी ते पत्र आपल्या प्रवासाची माहिती सगळ्याच कुटुंबाला व्हावी या हेतूने लिहिले आहे.


ब्राह्मसमाज २१०-६, कलकत्ता
३१ ऑगस्ट, १९२८.


चि. छबू
मागील बाजूवरील नकाशात मी ज्या ज्या शहरी जाणार आहे ती शहरे दिली आहेत. आणखीही ठिकाणी जाणार आहे. नकाशावर तुझ्या ही सर्व ठिकाणे पहा. म्हणजे तुझा भूगोल चांगला होईल. चितागॉंगकडे पूर्व किना-याकडे मी कदाचित जाणार नाही. बिहार आणि संयुक्त प्रांत पंजाबात जाईन. ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू तीन नद्या ओलांडीन. त्यात स्नानपान करीन. दार्जिलिंग, डेहराडून, रावळपिंडी ह्या तीन ठिकाणी हिमालयाचे दर्शन होईल. बंगाली, हिंदी व पंजाबी ह्या तीन भाषा ऐकेन. बोलपूर ( शांतिनिकेतन), बुद्धगया, काशी, प्रयाग, अमृतसर ही क्षेत्रे पाहीन व सर्व ठिकाणी ब्राह्मधर्माचा प्रचार करीन.


बबनला व अक्काला ही सर्व ठिकाणे दाखीव. हे व दुसरे पत्र वाचून झाल्यावर जनाक्काकडे पाठवून दे. मला बबनचे व तुझे उत्तर अद्यापि आले नाही. तुझे स्कॉलरशिपचे काय झाले ते कळले नाही. तुम्ही दोघे अभ्यास कसा करिता तो कळवा. इकडे पाऊस पडत आहे. हिमालयातील थंडी मला कशी सोसणार हे पहावे. हे सर्व आपटून डिसेंबरच्या मधे नाताळाचे अगोदर पुण्यास येण्याचा विचार आहे. त्या वेळी कौटुंबिक उपासनामंडळाचा उत्सव करावा असे वाटते. प्रकृती बरी आहे.


अण्णासाहेबांना नातवंडे झाल्यावर तर त्यांच्या कौटुंबिक जीवात आनंदाचे नवे निधान निर्माण झाले. १९३० साली ते येरवड्याच्या तुरुंगात असताना त्यांच्या मोठ्या सुनेला मुलगी झाली. ते तुरुंगात असताना जन्मली म्हणून त्यांनी तुरुंगी असे टोपणनाव बहाल केले होते. ह्या लहानग्या उर्मिलाचे ते परोपरीने लाड करीत. खेळवत, तिच्यावर कविता करण्याची ऊर्मीसुद्धा त्यांना येत असे. तशाच प्रकारची एक कविता त्यांनी केली आहे. ह्या कवितेत संदर्भ आहे तो सदाशिवराव केळकरांचे चिरंजीव डॉ. माधव यांचा. हे माधवराव निसर्गोपचाराचे कट्टर पुरस्कर्ते होते. एनिमा देणे व अंगाला बर्फ चोळणे याचा त्यांच्या उपचारात प्रमुख भाग असे. ( महात्मा गांधी आजारी असताना ह्याच माधवराव केळकरांनी त्यांच्यावर निसर्गोपचार केले होते व त्यांच्या उपचाराचा थोडासा लाभही आपल्याला झाला असे म. गांधीनी नमूद केले आहे. केळकरांच्या भेटीबद्दल म. गांधीनी असे लिहून ठेवले आहे की, "हे भेटताक्षणीच माझी खात्री पटली की, हे गृहस्थही माझ्यासारखेच विक्षिप्त आहेत.) लहानग्या उर्मिलावरची कविता
 

 

लेकी उर्मिला बाई !
परसाकडं पिवळी होई !
इथं काई कमोड न्हाई !
आता काय करुं बाई माधव आला ||

एनिमा घ्यायला उशीर झाला ||


लेकी उर्मिला बाई |
बाहिर गेली गं माई |
आजिबाई जवळी न्हाई |
आता काय करुं बाई माधव आला |
बरफ चोळायला उशीर झाला ||2||


लेकी उर्मिला बाई |
पोटात खडा होई |
तोंडात वकीर येई |
आता काय करुं बाई माधव आला |
फद्कन जुलाब झाला || 3||


उर्मिलाचे जसे त्यांना कौतुक होते तसेच तिसरी नात सुजाता हिचेही त्यांना कौतुक वाटत असे. एका खाजगी पत्रात ते लिहितात, "सुजाताचे डोळे मला निववितात."


बहुतेक नातवंडांची नावे ही अण्णासाहेबांनी सुचविलेल्याप्रमाणेच ठेवली गेली. ही बहुतेक महाभारत, बोद्ध धर्मग्रंथ अथवा ब्राह्मसमाज याशी संबंधित अशी उर्मिला, दमयंती, सुजाता, अशोक, दिलीप, नवीनचंद्र अशी होती. नातवंडांसमवेत खेळण्यामध्ये त्यांना आनंद वाटत असे. अगदी लहान नातवंडाला पाठीमागच्या झोळीत घालून ते चालू शकणा-याला बरोबर घेऊन ते भांबुडर्यातील काँग्रेसभवनाच्या पिछाडीस असलेल्या आपल्या घरातून फगर्युसन कॉलेजच्या टेकडीवर फिरायला जात. नातवंडांना खेळायला मोकळे सोडून ते निवांतपणे एखाद्या वडाच्या झाडाखाली बसत. वाटेत त्यांना भेटणारे लोक बरेच असत. भेटणा-या प्रत्येकाशी थोडा थोडा वेळ बोलण्यात गेल्यामुळे घरी पोहोचेपर्यंत बराच वेळ निघून जाई.


पुण्यामधील वास्तव्यात ज्या कुटुंबाशी त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता, ते म्हणजे गणपतराव शिंदे व अहल्याबाई शिंदे यांचे कुटुंब. ह्या दोघांबद्दल शिंदे यांनी किती जिव्हाळा वाटत होता याचे हृदयंगम व काव्यपूर्ण वर्णन त्यांनी आपल्या येरवड्याच्या रोजनिशीत केले आहे.


अण्णासाहेबांना व्यक्ती नव्हे तर कुटुंब हेच प्रेमाचे एकक वाटत होते. कोणाही व्यक्तीचा विचार जे कुटुंबविरहित उपेक्षा येत असते तिचाही अण्णासाहेबांच्या मनावर परिणाम झाला असला पाहिजे. त्याच्या आईचे उदाहरण तर त्यांच्या अंतःकरणात लहानपणापासून बाणासारखे घुसले होते. कदाचित ह्याचा परिणाम म्हणूनही स्त्रीचा विचार त्यांच्या मनामध्ये सदैव असे. त्यांच्या ठिकाणी असणा-या कुटुंबविषयक वृत्तीमुळे व जाणिवेमुळे ज्या वेळेला उपासनामंडळ स्थापन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला, त्या वेळी त्यांनी त्याचे स्वरुप कौटुंबिक उपासनामंडळ असेच ठेवले. कुटुंब हेच प्रेमाचे केंद्र होय, अशी त्यांची केवळ बौद्धिक धारणा होती असे नव्हे, तर त्यांच्या मनाची स्वाभाविक वृत्ती बनून गेली होती. म्हणून कौटुंबिक उपासना मंडळाच्या द्वारा पुण्यामधील कितीतरी कुटुंबे एकमेकांशी प्रेमाच्या धाग्याने जोडली गेली. वाईमधील ब्राह्मसमाजाची घडण करीत असताना व तेथील कार्याला चालना देत असताना अण्णासाहेबांनी विविध कुटुंबे एकत्र आणली, साप्ताहिक उपासना, वनोपासना यांसारख्या उपक्रमांच्या द्वारा अनेक कुटुंबांमध्ये परस्परांबद्दल त्यांनी प्रेम वृद्धिगत केले. अशा प्रकारच्या कौटुंबिक प्रेमामध्ये रममाण होण्यात अण्णासाहेब शिंदे यांना आंतरिक समाधान लाभत असे.


विद्यार्थिदशेत असल्यापासून जातिधर्माची बंधने ओलांडून त्यांचा सय्यद कुटुंबाशी स्नेहभाव जुळलेला होता. खरे तर सय्यदांचे वडील हेच प्रथमत: विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्नेही बनले. त्या दोघांच्य वयातील अंतर ह्या स्नेहामध्ये आड आले नाही. त्यांच्या कुटुंबात जाणेयेणे, खाणेपिणे ते सहजपणे करीत होते.  ह्या सय्यद कुटुंबाचा स्नेह पुढील काळातही आयुष्यभर टिकला. सय्यद हे अण्णासाहेबांपेक्षा वयाने थोडेसेच लहान होते. परंतु ते त्यांच्या वडिलांचे स्नेही असल्यामुळे सय्यदांकडे ते मुलाप्रमाणेच पाहत होते. सय्यद व कल्याणी यांच्या विवाहप्रसंगी प्रार्थनासमाजाला अनुसरुन त्यांनी पौरोहित्यही केले. सय्यदांचे कुटुंब हा शिंदे कुटुंबाचाच भाग बनलेला होता.


विठ्ठल रामजी शिंदे प्रार्थनासमाजेचे प्रचारक झाल्यानंतर मुंबईत राममोहन आश्रमात त्यांनी बि-हाड केले. शिंदे यांच्या प्रेमपूर्ण वृत्तीचा आविष्कार त्यांच्या आतिथ्य़शीलतेत होणे ही अत्यंत स्वाभाविक अशा प्रकारची गोष्ट होती. हे आतिथ्य करताना जात, धर्म ह्या गोष्टी त्यांच्याबाबतीत आड येण्याचा प्रश्नच नव्हता. भगवंतराव पाळेकर (जागृतीकार) हे बडोदा सोडून १९०५ साली मुंबईस आले होते. तेथे गेल्यानंतर ते प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आतिथ्यशीलतेचा त्यांना कसा अनुभव आला यासंबंधी त्यांनी स्वत:च लिहिले आहे, "१९०५ साली प्रसिद्ध अस्पृश्योद्धारक विठ्ठल रामजी शिंदे त्या वेळी प्रार्थनासमाजाच्या राममोहन रॉय आश्रमात राहत होते. त्यांचा माझा परिचय झाला. एकेवेळी त्यांचेकडे नागपूरचे अस्पृश्य समाजातील मुख्य कार्यकर्ते रा. किसन फागुजी बनसोडे, गणेश आकाजी गवई वगैरे मंडळी जेवावयास होती. श्री. शिंदे यांनी मला व माझ्या पत्नीला जेवणाचे आमंत्रण दिले. १९०६ सालची ही गोष्ट. पुरणपोळी आणि पायरीच्या आंब्यांच्या रसाचे जेवण होते. माझ्या पत्नीला इतक्या जुन्या काळीही अस्पृश्यांच्या पंगतीस जेवण्यात आपण अधर्मांचरण करीत आहे असे वाटले नाही. खुद्द शिंदे यांनाही आम्हा दोघांविषयी मोठा आदर वाटला.


प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून १९१० पर्यंत विठ्ठल रामजी शिंदे यांचे वास्तव्य राममोहन आश्रमात होते. वस्तुतः प्रचारक म्हणून मिळणारा त्यांचा पगार रुपये ६० एवढा तुटपुंजा होता. त्यातूनच त्यांना स्वतःच्या कामानिमित्त करावयाचा प्रवासखर्चही भागवावा लागे. मुंबई हे भारतातील ब्राह्मसमाजाचे तर केंद्र होतेच त्याशिवाय अन्य सांस्कृतिक कारणांनीही महत्त्वाचे शहर होते. त्यामुळे बंगाल, मद्रास वगैरे प्रांतांतून ब्राह्मसमाजी मंडळी वेगवेगळ्या निमित्ताने मुंबईस येत असत व त्यांचा मुक्काम राममोहन आश्रमात असे. ह्या बड्या मंडळींचे आतिथ्यही विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या आत्मीयतेने करीत असत.


अण्णासाहेब शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आतिथ्याची परंपरा पुढील काळात पुणे येथील वास्तव्यातही मोठ्या आनंदाने सांभाळलेली दिसून येते.


भाई माधवराव बागल यांनी विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून त्यांना मिळालेल्या प्रेमळ वागणुकीचे वर्णन केले आहे. प्रजापरिषदेच्या चळवळीमुळे माधवरावांवर कोल्हापूर संस्थानातून हद्दपार होण्याची पाळी आली होती. पुण्यास एका जवळच्या नातेवाईकाकडे आसरा मिळेल ह्या हिशेबाने ते पुण्यास आले. परंतु त्यांची अपेक्षा सफळ होईल असे त्यांना वाटले नाही. मुंबईस कोठेतरी हॉटेलमध्ये जाऊन राहावे असा त्यांनी विचार केला. मुंबईस जाण्यापूर्वी विठ्ठल रामजींचे दर्शन घ्यावे म्हणून त्यांच्या भेटीस ते गेले.


आपली सगळी हकिकत त्यांनी सांगितली. विठ्ठल रामजी शिंदे ही हकिकत समजताच त्यांनी माधवराव बागल व त्यांच्या पत्नी ह्या दोघांनाही आपल्या घरी राहण्यासाठी अगत्यपूर्वक निमंत्रण दिले. त्यांनाही असा आधार आणि आसरा हवा होता. अशा थोर पुरुषाच्या संगतीचा लाभ आपल्याला मिळणार म्हणून माधवरावांनाही आनंद वाटला. ते आपले सामानसुमान घेऊन विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी पत्नीसह येऊन राहिले. अण्णासाहेबांनी दाखविलेला हा घरोबा आणि आत्मीयता ही त्यांना आपल्या आयुष्यातील अभिमानास्पद बाब वाटत होती. त्यांच्या घरी ना नोकर ना स्वयंपाकी. जनाबाई अगत्याने पाहुणचार करीत होत्या.


केरो रावजी भोसले यांचे चिरंजीव अनंतराव यांनाही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्नेहमय वृत्तीचा अनुभव आला. केरो रावजी भोसले हे विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्रार्थनासमाजातील सहकारी. १९०६ सालापासून ते १९२० साली मृत्यू होईपर्यंत पंढरपूर येथे नवरंगे अनाथाश्रमाचे ते चालक होते. त्यांनी हे अनाथाश्रम अतिशय उत्तम त-हेने चालविले होते. ह्या अनाथ बालकांचा कपडालत्ता, अन्न वगैरे गरज भागणे एकवेळ शक्य असते. उदार दाते मिळाल्यावर ते घडूही शकते. परंतु सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आईबापांशिवाय असलेल्या ह्या बालकांना प्रेमाची वागणूक मिळणे. केरो रावजी भोसले हे अनाथाश्रमातील मुलांशी अत्यंत प्रेमळपणे वागत असत. परिणामत: ही मुले आईच्या मागे असावीत व तिच्या अंगाला झटावीत त्याप्रमाणे केरो रावजींशी लडिवाळपणाने वागत. अशा केरो रावजींबद्दल विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना फार प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यू १९२० साली झाला. केरो रावजींचे चिरंजीव अनंत हे तरुणपणी देशकार्यात पडले. १२ जानेवारी १९३३ रोजी त्यांनी पंढरपूर येथे सत्याग्रहात भाग घेतला. परदेशी कापडाची होळी करणे असे या सत्याग्रहाचे स्वरुप होते. या सत्याग्रहात सत्याग्रहींवर लाठीमार झाला. भोगले हे जखमी झाले. त्यानंतर झालेल्या धरपकडीत त्यांना पकडण्यात आले व दीड वर्षाची शिक्षा झाली. येरवड्याच्या तुरुंगात ही शिक्षा त्यांनी भोगली. तुरुंगातून सुटल्यानंतर ते पुण्यास आले व विठ्ठल रामजी शिंदे यांना भेटले. केरोपंत भोसले यांचा मुलगा आपल्याला भेटला, त्याच्या ठिकाणी देशभक्तीची ज्वलंत भावना आहे हे समजून त्यांना आनंद वाटला. वर्तमानपत्रात त्याचे नाव वाचल्याचेही त्यांनी सांगितले व त्यांना अगत्याने आपल्या घरी ठेवून घेतले. पुढे काय करणार असा अण्णासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला. आपण देशकार्य करणार असे उत्तर ह्या तरुण अनंताने त्यांना दिले. वास्तव जीवनाची कठोरता अनुभवलेल्या अण्णासाहेबांनी अनंताला विचारले, "पण दुपारची सोय काय?" हा प्रश्न विचारुन त्यांनी उदरनिर्वाहाच्या बिकट समस्येची अनंताला जाणीव करुन दिली. अनंताजवळ कोणतेच उत्तर नव्हते.

 

कोणते कौशल्य नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अण्णासाहेबांनी अनंताला सल्ला दिला की, "तू टेलरिंगचे शिक्षण घे.' पुण्यामध्ये जाधव टेलरिंग कॉलेज हा शिवणकाम शिकविणारा वर्ग होता. अण्णासाहेबांनी अनंताची सोय तेथे केली. अनंताला वस्तुत: हे काम आवडणारे नव्हते. परंतु अण्णासाहेबांनी सांगितलेले असल्यामुळे निष्ठावंतपणे दीडके वर्ष शिवणकामाचे शिक्षण घेऊन हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. आयुष्यातील अत्यंत बिकट काळात अण्णासाहेबांचे प्रेम, साहाय्य व मार्गदर्शन मिळाले, ह्याबद्दल भाई अनंत केरु भोसले यांना अजूनही अण्णासाहेबांबद्दल कृतज्ञता वाटते.

कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजाचे कार्य

मुंबई प्रार्थनासमाजाच्या कामामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. शिंदे स्वतः समाजाच्या कामात रंगून गेले होते. मात्र त्यांच्या घरच्या मंडळींची अवस्था समाधानकारक नव्हती. त्यांना जमखंडीसारख्या खुल्या हवेची सवय होती. मुंबईची कोंदट हवा त्यांना मानवेना. शिंदे यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांना १९०४च्या ऑक्टोबरमध्ये तिसरा मुलगा विश्वास झाला. त्या बाळंतपणापासून त्यांची प्रकृती खालावली. तशात शिंदे यांची बहीण चंद्राक्का हिला क्षयाची भावना जडली. १९०१ साली शिंदे यांचे मित्र वासुदेवराव सुखटणकर यांची बहीण शांताबाई हिला क्षयाची बाधा झाली होती म्हणून तिला शिंदे यांच्या घरी जमखंडीस हवापालटासाठी नेण्यात आले होते. चंद्राबाई ही नेहमी तिच्या सहवासात असल्यामुळे व नेहमी शुश्रूशेत असल्यामुळे क्षयरोगाच्या जंतूंनी तिच्या शरीरात प्रवेश केला व मुंबईच्या कोंदट हवेचा प्रतिकूल परिणाम झाल्याने चंद्राबाईला तोच रोग जडला. शिंदे यांच्या वृद्ध आई-वडिलांना ही एक नवीन चिंता निर्माण झाली.

१९०५च्या उन्हाळ्याच्या आरंभी शिंदे यांचे वडील चंद्राबाईला घेऊन खंडाळ्याला हवाबदलासाठी राहू लागले. तेथून त्यांनी पुण्यास राहावयाचे ठरविले व वेताळपेठेतील भाजेकरांच्या वाड्यात बि-हाड केले. विठ्ठल रामजी शिंदे हे मुंबईस येऊन-जाऊन पुण्यास राहत होते. या वर्षी शिंदे हे पुण्यातच जास्त वास्तव्य करून पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या कामात साह्य करू लागले.

पुणे येथील या मुक्कामात शिंदे यांनी एक महत्त्वाचे कार्य केले. ते १८९८ मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. तेव्हाच त्यांना आपण अस्पृश्यवर्गासाठी काही कार्य करावे अशी तळमळ राहून राहून लागली होती. मुंबई प्रार्थनासमाजाने काहीएक बोभाटा ना करता अस्पृश्यवर्गीयांना रात्रीच्या शाळांमध्ये शिक्षण द्यावयास आरंभ केला होता. प्रार्थनासमाजाच्या कार्याचा एक भाग म्हणून अस्पृश्यवर्गासाठी आपण शाळा उगडून काम करू शकतो हे शिंदे यांना स्वाभाविकपणे जाणवले. म्हणून १९०५ सालच्या रामनवमीच्या दिवशी मीठगंज पेठेत अस्पृश्यांसाठी एक रात्रीची शाळा शिंदे यांनी उघडली. मीठगंज पेठ हे महात्मा जोतीबा फुले यांच्या वास्तव्याचे ठिकाण. त्याच पेठेमध्ये शिंदे यांनी ही शाळा उघडावी ही घटना फुले यांचे खंडित झालेले कार्य शिंदे यांनी नव्या जोमाने सुरू करावयाचे ठरविले याची द्योतक म्हणावी लागेल.

ही शाळा उघडण्याच्या सुमारास हुजूरपागेतील ब-याच मैत्रिणी हजर होत्या. भिजवलेली डाळ व उसाच रस वाटण्यात आला. हा समारंभ भाजेकरांच्या वाड्यातच करण्यात आला. ही शाळा पुढे प्रार्थनासमाजाच्या स्वाधीन करण्यात आली आणि अखेरीस शिंदे यांनी पुढे काढलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्या संस्थेमध्ये सामील करण्यात आली.

शिंदे ह्यांचे पुण्यात बरेच वास्तव्य घडू लागल्याने त्यांना प्रार्थनासमाजाच्या पुणे येथील कामाला चालना देणे शक्य झाले. सुबोधपत्रिकेच्या इंग्रजी बाजूमध्ये शिंदे यांच्या विविध कार्याची माहिती आली आहे. तीमध्ये म्हटले आहे, श्री. वि. रा. शिंदे यांच्या येथील वास्तव्यामुळे पुणे प्रार्थनासमाजात नवे चैतन्य येऊ लागले आहे. आपल्या येथील थोड्या दिवसाच्या वास्तव्यामध्येच त्यांनी संगतसभा सुरू केली असून दर बुधवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये ती भरते. ते स्वतः उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग दर शुक्रवारी सायंकाळी भरवितात व सध्या आर्मस्ट्राँग यांचे देव आणि आत्मा हे पुस्तक ते विद्यार्थ्यांसमवेत वाचतात. या वर्गाला फर्ग्युसन, डेक्कन आणि सायन्स कॉलेजमधून सुमारे सोळा विद्यार्थी उपस्थित राहिले. शिंदे यांनी अशाच प्रकारचे वाचनवर्ग फर्ग्युसन व डेक्कन कॉलेजातही सुरू केले आहेत. या कामाशिवाय त्यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून ‘तुकाराम सोसायटी’ च्या बैठका डॉ. भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली नियमित भरू लागल्या आहेत.१

शिंदे यांची कामाची तळमळ, कामाचा झपाटा, त्यांचे संघटनाकौशल्य ह्यांचा लाभ पुणे प्रार्थनासमाजास निश्चितपणे झाला.

ह्या अवधीत शिंदे यांच्या कौटुंबिक विवंचना संपुष्टात आल्या नाहीत; उलट त्यांच्या विवंचनेत नव्याने भरच पडू लागली. चंद्राबाईच्या प्रकृतीला काही केल्या उतार पडेना, म्हणून तिला अहमदनगरच्या कोरड्या हवेत न्यावे लागले. तिच्याबरोबर त्यांचे वृद्ध आई-वडील होतेच. मुंबईत त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांची तब्येत जास्तच बिघडत चालली. तशात त्यांना झालेला तिसरा मुलगा विश्वास हा ऑक्टोबर महिन्यात वारला. म्हणून जनाक्काला मुंबईस मदतीसाठी जावे लागले. दुर्दैवाने तिलाही त्याचवेळी प्लुरसीची व्यथा जडली.

कौटुंबिक काळजीने शिंदे यांचे मन उद्विग्न असताना त्यामध्ये आणखी एका मनस्तापाची भर पडली. शिंदे यांच्या प्रचारकार्यावर नियंत्रण पडावे म्हणून एक स्वतंत्र नियमांची रचना करण्याचे घाटू लागले. त्याच्यासाठी एक पोट कमिटी नेमून प्रचारकाने तिच्या तंत्राने वागावे अशी वाटाघाट सुरू झाली. शिंदे यांच्या स्वतंत्र प्रकृतीला ते पटेना. आधी काम करावे, अनुभव घ्यावा आणि मग योग्यवेळी नियम करावे असा स्वाभाविक क्रम असणे त्यांना युक्त वाटत होते. शिंदे यांना प्रार्थनासमाजाच्या कार्याच्या व्याप्तीचा अंदाज अद्यापि नीट आलेला नव्हता. पैशाची पुरेशी तरतूद नाही. अशा परिस्थितीत शाब्दिक नियमांची गडबड करणे शिंदे यांना अस्थानी वाटत होते. त्यांनी आपल्या कामाची डायरी ठेवावी, वरचेवर अहवाल द्यावा वगैरे पिरपीर सुरू झाली. शिंदे कामाच्या ओघात ही कामे स्वयंस्फूर्तीने प्रथमपासून करीतच होते; पण अमक्याच वेळी व अमक्याच पद्धतीने ती व्हावीत अशा प्रकारचा नियमाचा काच त्यांना नकोसा वाटू लागला.

शिंदे यांचे मन चिरंजीव विश्वास ह्या मुलाच्या मृत्यूने उद्विग्न झाले होते. तेव्हा त्या वातावरणातून बाहेर पडावे व मनःशांती मिळवावी यासाठी त्यांनी महाराष्ट्रात व कर्नाटकात दौरा काढला.
संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, १९ मार्च १९०५.

कॉलेजची पहिली दोन वर्षं

विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला पुणे सेंटरला बसून १८९१ च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पास झाले. ह्या वर्षी जमखंडीच्या हायस्कूलमधून पाच विद्यार्थी मॅट्रिकच्या परीक्षेस बसण्यास पाठविले होते. त्यांपैकी चार उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांत विठ्ठल रामजी शिंदे यांचा पहिला क्रमांक होता.

मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे ही त्यांना विवंचना पडली. घरची आर्थिक स्थिती पाहता आपण नोकरी करावी असा त्यांनी विचार केला. नोकरी पाहण्यासाठी त्यांनी बेळगावात सुमारे सहा महीने काढले. परंतु नोकरीचे कोठे जमत नव्हते. त्या सुमारास जमखंडी हायस्कुलात शिक्षकाची जागा रिकामी झाली. हेडमास्तर श्री.त्रिंबकराव खांडेकर यांचे विठ्ठल रामजींबद्दल चांगला विद्यार्थी म्हणून अनुकूल मत झाले होतेच, त्यातून ते मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. याचा स्वाभाविक परिणाम म्हणून श्री. खांडेकरांनी त्यांना जमखंडीस बोलावून घेतले आणि रिकाम्या झालेल्या शिक्षकाच्या जागेवर त्यांची नेमणूक केली. हायस्कुलच्या सन १८८८ सालापासून नेमल्या गेलेल्या शिक्षकवर्गात २९व्या क्रमांकावर त्यांची ‘विठू रामा शिंदे, असिस्टंट मास्तर’ अशी नोंद केलेली पहावयास मिळते.१ हायस्कुलमध्ये नविन वाङ्मय, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादी शास्त्रविषयांच्या अभ्यासामुळे त्यांच्या ठिकाणी बुद्धिवादाचा प्रादुर्भाव झाला होता. शिक्षक असताना आगरकरांचा सुधारक त्यांच्या हाती पडू लागला. त्यामुळे त्यांच्या ठायी निर्माण झालेल्या बुद्धिवादी विचाराला चालना मिळु लागली. मात्रा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून दीर्घकाळ काम करण्याचा त्यांच्याबाबतीत योग नव्हता. इंग्रजी दुस-या इयत्तेवर दोन-तीन महिने त्यांनी काम केले नाही तोच जमखंडीकर सरकार रामचंद्रराव आप्पासाहेब यांनी त्यांना रामतीर्थास राजवाड्यावर बोलावून नेले व मुंबईस व्हेटरनरी कॉलेजमध्ये पंधरा रुपयांची स्कॉलरशिप देऊन पाठवितो, असे सांगितले. घरच्या वातावरणाचे संस्कार, वाङ्मय व शास्त्र यांच्या अभ्यासामुळे त्यांच्यात निर्माण झालेला सुसंस्कृतपणा यांमुळे त्यांच्या ठिकाणी उच्चतर आकांक्षा निर्माण होणे स्वाभाविक होते. सरकारची सूचना त्यांना अर्थातच पसंत पडली नाही. त्यांनी उत्तर दिले की, “मला जनावरांचा डॉक्टर व्हावयाचे नाही. आर्टस् कॉलेजमध्ये स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे.” विठ्ठल रामजींच्या उत्तरामुळे जमखंडीकर सरकारांना राग येऊन त्यांना ताबडतोब नोकरीवरून काढुन टाकले आणी दिपवाळीचा पगारही दिला नाही.२ हायस्कुलातील शिक्षकी पेशाची अशा त-हेने समाप्ती झाली.

पुढे काय करावे अशा विवंचनेत ते असतानाच त्यांच्या शिक्षणाला पुढची दिशा मिळाली. त्यांचे सहाव्या इयत्तेतील शिक्षक श्री. वासुदेवराव चिरमुले ह्यांनी त्यांना सांगितले की, पुणे येथे गरीब मराठा विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाच्या बाबतीत मदत करणारी एक संस्था आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी नवे निर्णय घेणे व निर्धाराने अमलात आणणे ह्याची क्षमता दांडगी होती. ह्याचा पडताळा त्यांच्या पुढील आयुष्यक्रमात दिसून येतोच. यावेळी त्यांनी धाडशी निर्णय घेतला. घरची अत्यंत गरिबी. कुणाच्या ओळखीपाळखीचा आधार नाही. अशा स्थितीत ते पुण्यासारख्या विस्तीर्ण शहरात येऊन पोहोचले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र पैशाची सोय अगदीच नव्हती. पुण्यात आल्यानंतर १८९३ मध्येच कोल्हापुरचे श्री. गोविंदराव सासने यांची व विठ्ठलरावांची ओळख झाली. त्यांच्या खोलीतच प्रारंभी पहिल्या टर्ममध्ये विठ्ठलराव राहीले. मात्र कॉलेजची फी आणि खानावळीचा खर्च कसा भागवावा ही काळजी होती. श्री. खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ ह्या संस्थेचे संस्थापक व सेक्रेटरी श्री. गंगाराम भाऊ म्हस्के यांची भेट घेण्याचे त्यांनी ठरवले.

श्री. गंगाराम भाऊ म्हस्के हे मराठा जातीचे सुधारकी बाण्याचे पुढारी व हुशार वकील अशी त्यांची त्या काळी प्रसिद्धी होती. रानडे, भांडारकर यांच्याप्रमाणे त्या काळच्या सुधारक पक्षात त्यांना चांगली मान्यता होती. मराठा संस्थानिक, राजे व इतर जातींचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थ त्यांना मानीत होते. ह्या धनिकांकडून मदत घेऊन त्यांनी व राजन्ना लिंगो नावाच्या वकिलांनी गरीब मराठा होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ ही संस्था काढली होती.

पुणे लष्करात मेन स्ट्रीटवर असलेल्या त्यांच्या टोलेजंग घरामध्ये विठ्ठलराव त्यांना भेटण्यासाठी गेले. पाश्चात्त्य धर्तीवर सजवलेल्या त्यांच्या घरातील वातावरण सुधारकी थाटाचे होते व म्हस्के साहेबांची राहणी व वर्तन पाश्चात्त्य धर्तीचे व सुधारकी वळणाचे होते. विठ्ठलरावांना त्यांनी खुर्चीवर जवळ बसावयास सांगून सर्व भाषण इंग्रजीत केले. दहा रुपयांची स्कॉलरशिप देणे शक्य आहे असे त्यांनी सांगितले. कॉलेजात जाण्याची कशीबशी सोय होईल अशी आशा उत्पन्न झाली. पण ह्या पलीकडे राहण्याची कींवा अभ्यासाची दुसरी कसलीही सोय म्हस्केसाहेबांनी केली नाही. किंवा कळकळ दाखविली नाही. एखाद्या युरोपियन सभ्य गृहस्थाचे वर्तन ज्याप्रमाणे एकाद्या नेटिव्ह माणसाशी बेताचेच असते तशी त्यांची वागण्याची ढब विठ्ठलरावांना जाणवली. एकंदरीत म्हस्केसाहेबांनी आपल्याला बरे वागविले व साहाय्य केले याबद्दल विठ्ठलरावांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली.

म्हस्केसाहेबांनी देऊ केलेल्या स्कॉलरशिपमुळे विठ्ठलराव फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकले. फर्ग्युसन कॉलेज त्या वेळी पुणे शहरात शनिवार पेठेतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यात होते. डेक्कन कॉलेजसारख्या भारी खर्चाच्या संस्थेत तुटपुंज्या स्कॉलरशिपच्या आधारावर जाण्याचा विचारही करणे त्यांना शक्य नव्हते. १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाल्यामुळे त्यांच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांची सोय होत होती. फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल, संस्कृत कोशकार वामन शिवराम आपटे हे नुकतेच वारल्याने त्यांच्या जागी प्रसिद्ध सुधारक श्री.गोपाळ गणेश आगरकर  यांची नेमणूक झाली होती. ते गावात न राहता हल्ली असलेल्या कॉलेजच्या इमारतीच्या जागेवर एक झोपडी बांधून राहत होते. आजूबाजूला अगदी वस्ती नव्हती. ‘डेक्कन मराठा असोसिएशन’च्या दरमहा दहा रुपयांच्या स्कॉलरशिपमध्ये एकंदर खर्च भागणे कठीण होते. कारण कॉलेजची फीच दरमहा पाच होती. म्हणून कॉलेजची फी माफ करण्याबद्दल विठ्ठलराव एक अर्ज घेऊन प्रिन्सिपॉल आगरकर यांना भेटावयास गेले.

श्री. गंगाराम भाऊ म्हस्के यांना भेटल्यानंतर पुणेरी सुधारक कसा असतो ह्याचे जे चित्र त्यांच्या मनावर उमटले होते त्याच्याशी आगरकरांचे दर्शन मात्र जुळणारे नव्हते. हिवाळयाच्या दिवसांतील सकाळी नऊची वेळ. आगरकर कायमचे दमेकरी. ते झोपडीच्या बाहेर अंगणात उभे होते. अंगामध्ये बराचसा फाटलेला काळा मळकट कोट, चित्पावनी थाटाचे नेसलेले धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस, भिवयांचे केस दाट व डोळे किंचित खोल व भेदक असे त्यांचे प्रथम दर्शन घडले. त्यांचा अर्ज पाहून व त्यांना ‘डेक्कन मराठा असोसिएशन’ ची स्कॉलरशिप मिळत आहे हे ऐकल्यावर, फी माफ व्हावयाची नाही असे निर्भीडपणे सांगून टाकले. उगाच नादाला लावण्यापेक्षा त्यांचे हे तडकाफडकी उत्तर योग्यच असले तरी त्या वेळी आगरकरांबद्दलचा विठ्ठलरावांचा ग्रह अनुकूल झाला नाही. त्यांची पैशाची अडचन तशीच राहिली. गोविंदराव सासने ह्यांचा थोडाफार आधार मिळत राहिला. अशा परिस्थितीतच त्यांचा प्रीव्हियसचा अभ्यासक्रम सुरू झाला.

विठ्ठल रामजी हे जमखंडीस प्राथमिक शाळेतून हायस्कुलमध्ये ज्या वेळी गेले त्या वेळेस त्यांना नवा अभ्यासक्रम, आस्थेवाईकपणे व प्रेमळपणे शिकविणारा शिक्षकवर्ग यांमुळे त्यांच्यात अभ्यासाबद्दल उत्साह संचारला होता व एक नवे जग खुले झाल्यासारखे त्यांना वाटत होते. परंतु कॉलेजमध्ये आल्यानंतर व येथील शिक्षणपद्धती बघितल्यावर त्यांचा अनुकूल ग्रह तर झाला नाहीच, उलट त्यांच्या मनावर प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम झाला. त्या वेळी प्रीव्हियस वर्गाच्या दोन तुकड्या असल्या तरी प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या असल्या तरी प्रत्येक वर्गात पाऊणशेपर्यंत विद्यार्थी असत. त्यांचा वर्ग गद्रेवाड्याच्या समोरच्या मोठ्या दिवाणखान्यात भरत असे. शिक्षणपद्धतीत स्थित्यंतर झालेले होते. कॉलेजशिक्षणाचे वेगळे लक्षण म्हणजे व्याख्यानपद्धती. शे-पन्नास मुलांनी उंच व्यासपीठावरील शिक्षकाचे निरूपण ऐकत बसणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने हायस्कूलमधल्या वैयक्तिक शिक्षणपद्धतीला मुकणे होते. ह्या व्याख्यानपद्धतीमुळे व विद्यार्थ्यांच्या भरमसाठ संख्येमुळे शिक्षकाचा शिष्याशी व्यक्तिगत संबंध तुटतो आणि विद्यार्थी धागा तुटलेल्या पतंगाप्रमाणे शिक्षकांपासून कितीतरी लांब जातो, अशा प्रकारची प्रतीती विठ्ठलरावांना येत होती. हायस्कूलच्या काळातील शिक्षकांबद्दल त्यांनी जसे आत्मीयतेने व आदराने लिहिले आहे तसे कॉलेजमधील कुणाही प्राध्यापकांबद्दल त्यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहिलेले नाही. त्यांच्या आर्थिक अडचणीमुळेही कॉलेजमधील वातावरणाशी ते समरसून गेले नसावेत हे अधिक कारण संभवते. कॉलेजात गेल्यानंतर व्याख्यान ऐकणारे आपण सभ्य गृहस्थ झालो आहोत अशी एक प्रकारची आढ्यतेची जाणीव बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असे, हे त्यांनी नमूद केले आहे. विठ्ठलरावांच्या ठिकाणी मात्र अशा प्रकारची स्वयंमन्यता निर्माण झाली नाही. उलट एक प्रकारचा लाजाळूपणा, संकोचीपणा व धीटपणाचा अभाव त्यांच्या ठिकाणी होता. वर्गात सर्वात मागच्या बाकावर ते बसत असत. कॉलेजमध्ये ते निःसंकोचपणे वावरू शकत नव्हते असे दिसते. कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. तेथील अभ्यासक्रम सुरू झाला. परंतु पैशाची अडचण दूर झालेली नव्हती. स्कॉलरशिप अवघी दरमहा दहा रुपयाची. फी माफीचा अर्ज प्रिन्सिपॉलसाहेबांनी धुडकावून लावलेला. दरमहा पाचप्रमाणे कॉलेज फी. सगळ्या टर्मची तीस रूपये आगाऊ भरावयाची होती. कॉलेजची पुस्तके व उपकरणे घ्यावयाची होतीच. मग खोलीभाड्याला व खानावळीला काय उरणार? ह्या प्रश्नाचे उत्तर शिंदे देतात, “त्या वेळची स्वस्ताई आणि त्यापेक्षा निखालस उत्तर म्हणजे गरजा आणि उणिवा सहन करण्याची माझी अपार तयारी. माझ्या आईबाबांनी विशेषतः ही माझी तयारी सगळ्या आयुष्यभर पुरून मागे मुलाबाळांस लागल्यास उरेल इतकी केली होती.”

१८९३च्या प्रारंभी कोल्हापूरचे श्री. गोविंदराव सासने यांचा विठ्ठलरावांशी परिचय झाला. त्या वेळी गोविंदराव हे पुणे नेटिव्ह इन्स्टिट्युशन नावाच्या हायस्कुलात सातव्या इयत्तेचे विद्यार्थी होते. वयाने ते विठ्ठलरावांपेक्षा चार सहा महिन्यांनी मोठे होते. दिलदार स्वभावाच्या गोविंदरावांशी विठ्ठलरावांचा स्नेहसंबंध जुळला व ते घरातल्या माणसासारखे जवळचे भासू लागले. गोविंदरावांची घरगुती स्थिती चांगली होती. त्यांचे कोल्हापुरात फौजदार होते. खाऊन-पिऊन सुखी असे ते कुटुंब होते. विठ्ठलरावांची उदार मते व मोकळा स्वभाव गोविंदरावांना फारच आवडला. ते दोघे जरी भिन्न वर्गात शिकत होते तरी एकमेकांचा चांगुलपणा ओळखून मित्रत्वाच्या जवळकीच्या नात्याने वागत होते. गोविंदरावांचे वडील १८९३च्या मार्चमध्ये वारले. त्यामुळे त्यांना कोल्हापूरला निघून जावे लागले. म्हणून प्रीव्हियसच्या दुस-या टर्ममध्ये विठ्ठलराव हे मुधोळचे श्री. जनार्दन सखाराम करंदीकर व जमखंडीचे विश्वनाथ पोंक्षे यांच्यासमवेत राहावयास फुकट मिळाली. ह्या खोलीत केव्हा केव्हा अभ्यास करायला व विशेषतः अभ्यासक्रमात लावलेली जेन ऑस्टेनची प्राइड अँण्ड प्रेज्युडिस ही कादंबरी मिळून वाचण्यासाठी वाईचे केशव रामचंद्र कानिटकर हेही येत असत. (हेच पुढे फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल झाले.) ह्या जमखंडीकर मित्रांना पुण्यात लाभलेला, मात्र पुण्याचा नव्हे, तर बाहेरगावचा एकमेव सोबती आणि मित्र. विठ्ठलरावांची आणि त्यांची मैत्री अखेरपर्यंत टिकली. खुद्द पुण्याचा म्हणता येईल अशा एकाही विद्यार्थ्याने अंगाशी लावून घेतले नाही.

राहण्याची सोय अशी झाली. खाणावळीला साडेचार-पाच रुपये पडायचे. पुण्याच्या तेव्हाच्या हौदात गल्लोगल्ली आंघोळीला थंडगार पाणी मुबलक मिळे. किरकोळ खर्च तिघेजण गोडीगुलाबीने वाटून घेत असत. ही स्वस्ताई म्हणून पुण्यास राहून शिक्षण घेणे शक्य झाले. पण पैशापैशाला दांडगे मोल होते हे विठ्ठलरावांना अनुभवाने पटले होते. म्हणून पैसा वाचविण्यासाठी वाटेल तितके शारीरिक हाल करून घेऊन काटकसर करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. कॉलेजात दरवर्षी दोन मोठ्या सुट्ट्या असत. त्या वेळी खानावळीचा जो खर्च वाचे त्यातून ते गावी जाण्यासाठी आगगाडीचा खर्च करीत. जमखंडी गावी जाण्यासाठी सदर्न रेल्वेच्या कुडची स्टेशनवर उतरावे लागे. कुडची स्टेशनवरून जमखंडीस जावयाला तेहतीस मैलांचा रस्ता होता. बैलगाडीस एका स्वारीला चार आण्यापासून फार तर आठ आण्यापर्यंत खर्च येई. परंतु बैलगाडीच्या प्रवासखर्चाचे चारआठ आणे वाचविण्यासाठी कित्येक वेळा सगळा बोजा अंगावर घेऊन विठ्ठलराव सर्व प्रवास पायी करीत असत. त्यांच्या ह्या काटकसरी स्वभावाचे आणि विचारीपणाचे त्यांच्या वडिलांना फार कौतुक वाटत असे व इतरांसमोर ह्या बाबीचा ते उल्लेखही करीत. अशा काटकसरीतच त्यांनी कॉलेजची पहिली तीन वर्षे म्हणजे इंटरमिजिएटची परीक्षा दुस-यांदा बसून पास होईपर्यंतचे दिवस मोठ्या कष्टाने काढले.

प्रीव्हियसच्या वर्षात अखेरच्या काळात पैशाची मोठी नड निर्माण झाली. कॉलेजातील प्रीव्हियसची प्रिलिमिनरी अथवा चाचणी परीक्षा ते पास झाले. मुंबई विश्वविद्यालयाच्या प्रीव्हियसच्या परीक्षेला त्यांना बसावयाचे तर परीक्षा फी वीस रुपये भरणे आवश्यक होते. परीक्षेचा फॉर्म भरण्याचे दिवस जवळ येत चालले. वीस रूपये कोठून मिळवायचे हा बिकट प्रश्न त्यांना पडला. कठीण वेळ आली होती. प्रीव्हियसच्याही पूर्वीची एक अधिकचीच परीक्षा देण्याचा हा प्रसंग त्यांच्यावर गुदरला होता. ते चिंतेत असताना ताडपत्रीकराच्या वाड्यात भटकीसाठी येणारे ब्राह्मण गृहस्थ नरहरपंत यांनी विठ्ठलरावांना एक मार्ग दाखविला. नरहरपंतांनी त्यांना रावबहादूर नवलकर या गृहस्थाकडे नेले. त्यांनी विठ्ठलरावांना परीक्षेच्या फीसाठी दोन रुपये दिले व त्यांची फार निकडीची गरज आहे म्हणून ताबडतोब मदत करवी अशा अर्थाची चिठ्ठी देऊन आपल्या काही मित्रांची नावे कळविली. अशा प्रकारे याचना करणे त्यांच्या अत्यंत जीवावर आले, परंतु नरहरपंतांनीच बळेबळे त्यांना रावबहादूर महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकुष्ण गोपाळ भांडारकर, सरदार कुप्पुस्वामी मुदलियार, वकील राजन्ना लिंगो वगैरे मोठमोठ्या माणसांकडे पाठविले. ह्या इतक्या मोठ्या माणसांकडे जाऊन उभे राहणे त्यांना अत्यंत वेदनादायक झाले होते. तरी काही लोकांकडे जाऊन सारे चौदाच रूपये जमले. फी भरण्याची तारीख तर जवळ आली होती. नरहरपंतांनी अखेर शुक्रवार पेठेतील डॉ. शेळके यांच्याकडे पाठवले. नवलकरांची चिठ्ठी त्यांच्यासमोर ठेवल्याबरोबर विठ्ठलरावांना त्यांनी आयुष्यभर लक्षात राहावे असे तासडले. “मराठ्याच्या कुळात जन्मून असे भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसे नसल्यास गुरे राखावीत. कशास शिकावे?’’ वगैरे वगैरे. डॉ. शेळके यांचे बोलणे ऐकून त्यांच्या अंगाला घाम आला. ह्या मराठा जमदग्नीपुढून चिठ्ठी आणि पैसे तसेच ठेवून निसटावे असे त्यांना वाटले. डॉ. शेळक्यांच्या संदर्भात शिंदे यांनी लिहिले आहे, “ह्या पुढे मी स्वतःसाठी कुणापुढे भीक अशी कधीच मागितली नाही तरी आतापर्यंत माझा व माझ्यावर अवलंबून असणा-यांचा योगक्षेम चालला याचे श्रेय डॉ. शेळके यांना देणे बरे वाटते! परोपकारासाठी पुढे लाखो रुपये जमविण्याची पात्रता व इच्छा मला आली ह्यातही कदाचित डॉ. शेळके ह्यांचाच हा विरोधी आशीर्वाद कारण झाला असेल, नसेल कशावरून?’’

अखेरीस पैशाचा हा बिकट प्रसंग अनपेक्षितपणे व हृदयस्पर्शी त-हेने सुटला. तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे हे विठ्ठलरावांचे जमखंडीपासूनचे अत्यंत जिवलग मित्र. विठ्ठलरावांची अडचण त्यांना जाणवली होती. ते घरचे श्रीमंत असले तरी कारभाराचे त्यांचे वय झाले नसल्यामुळे त्यांच्या हातात पैसा खेळत नव्हता. विठ्ठलरावांची अडचण जाणवून त्यांना तळमळ लागून राहिली. त्यांची प्रेमळ पत्नी सौ. बहिणाबाई यांना ही तळमळ पाहवेना. त्यांनी आपल्या माहेराकडून भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले वीस रुपये विष्णुपंतांमार्फत विठ्ठलरावांना पोहोचवले. जुन्या वळणातील ही साध्वी बाई विठ्ठलरावांना आपल्या नव-याचा मोठा भाऊ समजून पुढील आयुष्यात कधीही त्यांच्यासमोर उभी राहिली नाही. बहिणाबांईंनी दाखविलेल्या कळकळीचा हा मासला जेवढा अपूर्व तेवढा अंतःकरणाला भिडणारा. उरलेला फीच्या पैशाचा आणि परीक्षेसाठी मुंबईच्या खर्चाचा विठ्ठलरावांचा प्रश्न अशा त-हेने सुटला.

प्रीव्हियसच्या परीक्षेच्या निमित्ताने विठ्ठलरावांना मुंबईचे प्रथम दर्शन घडले. त्यांनी कांदेवाडीत खत्रे यांच्या चाळीत एका खोलीत जागा  घेऊन परीक्षेसाठी मुंबईत वास्तव्य केले. जागेपणीचा लगळा वेळ परीक्षेचे पेपर लिहिण्यात आणि अभ्यास करण्यात जात असल्यामुळे मुंबई बघणे असे त्यांच्याकडून झाले नाही. पण मुंबईची कोंडलेली गर्दीची वस्ती, समुद्रकाठची घामट हवा आणि मुंबईच्या लोकांचा आत्माशून्य वरपांगी स्वभाव जाणवून मुंबईच्या ह्या पहिल्या भेटीचा परिणाम त्यांच्या मनावर अनुकूल स्वरूपाचा झाला नाही.

इंटरमीजिएटचे वर्ष
प्रीव्हियसची परीक्षा देऊन आल्यानंतर विठ्ठलराव जमखंडी येथे असताना ते परीक्षा पास झाल्याचे कळले. कॉलेजची परीक्षा पास झालेला पहिलाच विद्यार्थी म्हणून जमखंडी गावात त्यांची अधिकच ख्याती पसरली. पुण्यात परत आल्यानंतर मुंबई इलाख्यातील प्रीव्हियसला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांत आपला नंबर कितवा आहे हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांची मोठी निराशा झाली. त्यांचा नंबर पहिल्या किंवा दुर-या वर्गात तर आला नव्हताच, पण तिस-या वर्गातही फारसा वरती नव्हता. ह्यामुळे ते अंतर्मुख झाले. कॉलेजशिक्षणात निस्तेज होण्याचे एक कारण म्हणजे, घरच्या गरीबीची जाणीव ते हायस्कूलमध्ये असताना होत नव्हती ती आईबापांपासून दूर पुण्यात एकटे राहू लागल्यामुळे तीव्रपणे होत होती. अनेक कारणांमुळे कॉलेजच्या शिक्षणात त्यांचे चित्त लागत नव्हते. हायस्कुलातील मनाची तरतरी व हौस झपाट्याने मावळू लागली. पैशाच्या अडचणीत आणखी भर म्हणजे जमखंडीचे यजमान श्रीमंत अप्पासाहेब रामचंद्रराव यांनी त्यांच्या वडीलांना याच सुमारास नोकरीवरून कमी केले. विठ्ठलरावांनी श्रीमंतांनी देऊ केलेली स्कॉलरशिप घेऊन व्हेटर्नरी कॉलेजात जावयास नकार दिला होता व आपल्या कल्पनेनुसार आर्टस् चे शिक्षण सुरू करून ते कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे श्रीमंतांना राग येऊन त्याचे पर्यवसान वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने त्यांच्या वडिलांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले असावे.

प्रीव्हियसची परीक्षा पास होऊन विठ्ठलराव परत पुण्यास आले. गोविंदराव सासने हे वडिलांच्या मृत्यूनंतर घरची व्यवस्था लावून परत पुण्यास शिकण्यास आले. नारायण पेठेत मुंजाबाच्या बोळासमोरील केळकरांच्या वाड्यात त्यांनी खोली घेतली. विठ्ठलरावांची एक खोली व गोविंदरावांची एक खोली असे जोडखोलीचे हे एक दालन होते. दुस-या जोडखोलीच्या दालनामध्ये विजापुरचे गोविंदराव कलकेरी आणि कोल्हापूरचे तळाशीकर राहत होते. ह्या कळात पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे व मुधोळचे जनार्दनपंत करंदीकर हे त्यांचे जमखंडीचे बालमित्र पुन्हा एकत्र आले. प्रीव्हियसच्या प्रारंभी गोविंदराव सासने यांची मैत्री झाली आणि वाईचे केशव रामचंद्र कानिटकर हे वर्गमित्र झाले. या चौघाजणांची विठ्ठलरावांनी असलेली मैत्री अखेरपर्यंत टिकून राहिली.

खर्चात काटकसर करण्याचा एक भाग म्हणून खानावळीत न जाता घरीच स्वयंपाक करावा असे विठ्ठलरावांनी ठरवले व केवळ त्यांच्यासाठी म्हणून गोविंदरावांनीही तसेच ठरविले.  दुस-या टर्ममधे परीक्षेचे दिवस जवळ आल्यावर व अभ्यासाला जास्तीतजास्त वेळ देण्याची निकड भासू लागल्यानंतर त्यांना हे स्वयंपाकव्रत सोडून द्यावे लागले. दुसरी गोष्ट म्हणजे एक भात सोडला तर दुसरा कोणताही पदार्थ तयार करण्याचे कौशल्य ह्या दोघांमध्येही निर्माण होणे शक्य नव्हते. आर्थिक दुःस्थितीमुळे व आईबापांपासून दूर राहावे लागल्यामुळे विठ्ठलरावांच्या स्वभावातील आनंदीपणा कमी झाला. अकाली पोक्तपणा व विचारीपणा आला. खेळकरपणा मावळला आणि इतरांशी मैत्री करण्याची हौसही नाहीशी होऊ लागली. एवढेच नव्हे तर कॉलेजच्या वर्गातील ठरीव अभ्यासावरून मनही उडू लागले. एकंदरीत तत्कालीन विश्वविद्यालये व तेथील चैतन्यरहित शिक्षणपद्धती यासंबंधी एक प्रकारची विरक्ती त्यांच्या मनामध्ये वाढू लागली. मनाच्या ह्या अवस्थेत अभ्यासाची त्यांच्याकडून हयगय होऊ लागली.

ठरीव अभ्यासावरून विठ्ठलरावांचे मन उडाले असले तरी त्यांच्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला अशातला मात्र भाग नव्हता. चैतन्ययुक्त अभ्यासक्रमाची उणीव ते अभ्यासक्रमाबाहेरचे वाचन करून जणू काय भरून काढीत होते. त्यांचे वाचन त्या काळाच्या मानाने बरे चालले होते. फर्ग्युसन कॉलेजात पुस्तके मिळण्यास अडचण नव्हती. प्रीव्हियसच्या वर्गात असतानाच जॉन स्टु्अर्ट मिलसारख्या तत्त्वज्ञानाचा आणि मेकॉलेसारख्या निबंधकराचा परिचय घडला होता. मिलचे लिबर्टी(स्वातंत्र्य), युटिलिटेरिऍनिझम(उपयोगवाद, बहुजनहितवाद), सब्जेक्शन ऑफ वुइमेन(स्त्रियांची गुलामगिरी) हे ग्रंथ मुळातून त्यांनी वाचले. त्यांमधील विचारांच्या नवेपणामुळे विठ्ठलराव अगदी प्रभावित झाले होते. इंटरमीजिएटमध्ये आल्यावर हर्बर्ट स्पेन्सरच्या एज्युकेशन(शिक्षण), इंट्रॉडक्शन ऑफ द स्टडी ऑफ सोशॉलॉजी ह्या मूळ ग्रंथांचे वाचन त्यांनी मनापासून केले. त्या काळी स्पेन्सरची चलती युरोप अमेरिकेतच नव्हे तर हिंदुस्थान व जपानसारख्या पौर्वात्य देशांतही मोठ्या प्रमाणात होती. त्या काळचे कॉलेजातील बहुतेक शिक्षक स्पेन्सरच्या अज्ञेयवादाने जवळ जवळ झपाटल्यासारखे झाले. होते. दाभोळकर नावाच्या गृहस्थांनी सुरू केलेल्या स्पेन्सरचा ग्रंथांच्या भाषांतरमालेतील पुस्तकेही विठ्ठलराव अधाशाप्रमाणे वाचीत होते. मिलस्पेन्सरचा तत्कालीन वातावरणावर कसा प्रभाव होता आणि खुद्द विठ्ठलरावांवर पडलेल्या प्रभावाची परीणती नास्तिकपणा कशी झाली हे सांगताना ते लिहितात, “जेथे आमचे गुरूच त्या नवीन विचाराने असे हैराण झालेले, मग माझ्यासारख्या उतावळ्या विदयार्थ्याची अत्यवस्था झाली, असे म्हणावयाला काय हरकत आहे? पुस्तके जरी मी म्हणण्यासारखी पुष्कळशी वाचली नसली तरी जी तात्विक महत्त्वाची त्यांचा माझ्यामध्ये फार जोराचा अभिनिवेश घडला. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे जमखंडीतल्या आमच्या वाडयातल्या अंधे-या देवघरात बसून श्री शिवलीलामृताचे पारायण करीत शिवलिंगावर श्रावणी सोमवारी सहस्त्रदळे वाहिल्याशिवाय तोंडात पाणी न घेणारा मी पुण्यात आल्यावर आगरकरांचे लेख आणि मिल्-स्पेन्सरचे प्रत्यक्ष ग्रंथ वाचून पुण्यातल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठ्या नास्तिक बनलो!’’३

विठ्ठलराव हे वाचून स्वस्थ बसणा-यांपैकी तरुण नव्हते. जे आपल्या मनात आले ते
दुस-याजवळ बोलून त्यावर चर्चा करण्याची प्रबळ ऊर्मी त्यांच्या ठिकाणी होती. “पोटात घटकाभर विष आवरेल पण नविन विचार अगर सुंदर अनुभव मनाला घडला की कुणातरी सहानुभूतीच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे.’’ नव्या विचारअनुभवाबद्दल विठ्ठलरावांच्या ठिकाणी अशा प्रकारचा उत्साह असल्यामुळे केळकरांच्या वाड्यात त्यांनी एक छोटेखानी चर्चामंडळ स्थापन केले. मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर जमखंडीतील वसंत व्याख्यानमालेतही विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-दाक्षिण्य यांसारख्या भारदस्त विषयांवर भाषणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. त्यातून पुण्यसारख्या ‘वाचाळ’ आणि मुंबईसारख्या ‘चवचाल’ शहरांचा संपर्क घडल्यावर त्यांच्यासारख्याच्या उत्साहाला भरते येणे स्वाभाविक होते. मंडळातील सभांतूनच नव्हे तर विद्यार्थ्यांत होणा-या खासगी संभाषणातही ते त्यांना आपला ‘नविन तुटपुंजा नास्तिकपणा’ शिकवू लागले. त्या वेळी लिहिलेल्या एका छोटेखानी इंग्रजी निबंधात “देवाने माणसाला निर्माण केले नसून उलट माणसानेच देवाला निर्माण केले,’’ अशी भूमिका जोरदारपणे मांडली होती.४


अनेकविध कारणांमुळे परीक्षेसाठी नेमलेल्या अभ्यासक्रमावर विठ्ठलरावांचे चित्त बसले नाही हे वर आलेच आहे. त्यातून त्यांचा ओढा वरील प्रकारच्या अभ्यासक्रमाबाहेरच्या वाचनाकडे लागून राहिला. त्यातच भर म्हणजे चर्चामंडळातील वादविवादाची. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून विठ्ठलरावांना इंटरमीजिएट परीक्षेत अपयश आले. त्यातून विशेष बाब अशी की, तर्कशास्त्र या त्यांच्या आवडत्या विषयातच ते नापास झाले होते. परीक्षेत नापास होण्याचा त्यांना आयुष्यात जो अनुभव नव्हता तो आला. मात्र विश्वविद्यालयीन परीक्षेबद्दलची त्यांची आदरबुद्धी कमी होऊ लागली. त्यांच्या़ ठिकाणी स्वत:बद्दलचा एक खोलवरचा आत्मविश्वास होता. त्यामुळे परीक्षेत नापास होण्याचा सगळा दोष स्वत:कडे घ्यायला त्यांचे मन होत नसावे. काही एका प्रमाणात ते नाउमेद झाले असले तरी, १८९५च्या जानेवारीत जमखंडीहून कॉलेजच्या अभ्यासक्रमासाठी पुन्हा पुण्याला निघाले.

पहिली टर्म संपल्यानंतर मे महिन्याच्या सुटीत विठ्ठलराव जमखंडीला गेले. ह्यावेळी विठ्ठलराव व गोविंदराव हे दोघे आपल्या कुटुंबातील कुणाला तरी आणून पुण्यास बि-हाड करावे असा विचार करत होते. त्यांना खाणावळीच्या जेवणाचा दरमहा पाच रूपये हा दरही जास्त वाटत होता. मात्र पुण्यात बि-हाड करण्या स्वत:च्या घरचे जेवण व त्यामुळे होणारी काटकसर हे केवळ कारण नसून घरातील स्त्रीनातलगांना स्त्रीशिक्षण व प्रवासाचा लाभ देण्याचा सुधारकी हेतूही त्यांच्या मनात निर्माण झाला होता. हा प्रत्यक्ष परिणाम “हरी नारायण आपटे यांच्या कादंब-यांचा.’’५ ह्या सुमारास विठ्ठलरावांची बहीण जनाक्का हिच्यावर दुर्धर प्रसंग कोसळला होता. जनाक्काच्या सासरी तिचा छळ सुरू झालेला होता. अशा परिस्थितीत जनाक्काला माहेरी परत आणण्याचा आग्रह विठ्ठलरावांनी धरला होता. १८९५च्या दुस-या टर्ममध्ये विठ्ठलराव पुण्यास आले ते त्यांची मातोश्री आणि बहीण जनाबाई यांना बरोबर घेऊनच. जनाक्काला सासर सोडणे व परत माहेरी जमखंडीस येणे का भाग पडले ते तिच्या दु:खद संसारकथेवरून कळण्याजोगे आहे.

संदर्भ
१.    रा.द. रानडे इ.(संपा.),परशुरामभाऊ हायस्कूल सुवर्ण-महोत्सव स्मासकग्रंथ, जमखंडी, १९३८ परिशिष्ट १,पृ. २.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ८६.
३.    तत्रैव, पृ. ९९.
४.    तत्रैव, पृ. १००.
५.    तत्रैव, पृ. १०३.

कुटुंबातील मृत्यू

१९१७ सालापासून पुढची पाच-सहा वर्षे अण्णासाहेबांच्या आयुष्यात अतिशय व्यग्रतेची ठरली. सार्वजनिक जीवनामध्ये अनेक कटू प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनातही जिव्हाळ्याच्या माणसांच्या मृत्यूचे दुःख त्यांच्या वाट्याला आले.


१९१८ साली मुंबईमध्ये इन्फुएंझाची मोठी साथ सुरू झाली व पुणे शहरातही या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाली. मिशनचे ठाणे त्या वेळी लष्करातील ताबूत स्ट्रीटमध्ये होते. म्युनिसिपालटीकडून इन्फुएंझा मिक्शचरच्या मोठमोठ्या बाटल्या भरून आणून लष्करात गरीब लोकांच्या घरी वाटण्याचे काम मिशनच्या मार्फत सुरू करण्यात आले.

अण्णासाहेबांच्या घरची मंडळीही इन्फुएंझाने आजारी पडली होती. बरे वाटल्यावर औषध वाटण्याचे काम तीही करू लागली. अण्णासाहेबांचे धाकटे बंधू एकनाथराव हे त्या वेळेला मुंबईस राहत होते व त्यांच्या पत्नी मथुराबाई आठ महिन्यांच्या गरोदर असताना या साथीच्या रोगाने आजारी पडल्या व त्यांना ‘रुक्मिणी हॉस्पिटल’ मध्ये दाखल केल्याचे कळताच अण्णासाहेब मुंबईस गेले. या अवस्थेतच मथुराबाई वाळंत झाल्या व त्यांचे नवजात मूल वारले. सोनापूरचे दहन स्मशानभूमीचे ट्रस्टी व मुंबईचे मराठे यांमध्ये वाद निर्माण झालेला होता व मराठ्यां प्रेत जाळण्याला ट्रस्टींकडून हरकत घेतली जात असे. विठ्ठल रामजींनी स्मशानातील रजिस्टारची भेट घेतल्यानंतर घेतल्यानंतर मृत अर्भकाला पुरण्यासाठी खड्डा मिळाला. हा अंत्यविधी आटोपून अपरात्री ते घरी आल्याबरोबर त्यांना दुःखद वार्ता समजली की हॉस्पिटलमध्ये मथुराबाई निवर्तल्या. मथुराबाई ह्या त्यांच्या मामाच्या कन्या. अभ्यासात हुशार होत्या म्हणून अण्णासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले होते. पुण्यास ट्रेनिंग कॉलेजात घातले होते. त्यांचे अवांतर वाचन होण्यासाठी त्यांना पुस्तके घेऊन देत असत. घरातील इतर माणसांच्या बरोबरच त्यांच्याशीही पत्रव्यवहार ठेवीत. मथुराबाईंवर अण्णासाहेबांचा त्यांच्या गुणांमुळे लोभ जडलेला होता. स्वाभाविकपणेच त्यांचा मृत्यू हा अण्णासाहेबांना दुःखदायक ठरला. मथुराबाईंचे प्रेत दुस-या दिवशी सोनापूर स्मशानभूमीत नेले असता तेथे एका वेगळ्याच अडचणीला तोंड द्यावे लगले. इन्फ्लुएंझाच्या साथीमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे स्मशानभूमीत लाकडाचा तुटवडा पडला होता. अण्णासाहेबांचे मित्र लक्ष्मीदास तेरसी यांची तेथे गाठ पडली. तेरसी हे अण्णासाहेबांचे एकेरी भाषेतील जवळचे मित्र होते. अण्णासाहेब हे अशा प्रकारच्या अडचणीत सापडले आहेत हे लक्षात आल्यावर तेरसींनी स्मशानभूमीत लाकडे आणण्याची व्यवस्था केली. लाकडाच्या ओंडक्यांनी भरलेल्या लॉ-या सोनापुरात येऊ लागल्या. एका लॉरीवर तर स्वतः तेरसी व दुसरीवर म्युनिसिपालटीचे अध्यक्ष सी. व्ही. मेहता हे गाडी हाकीत आले व अशा दुःखद वातावरणामध्ये निर्माण झालेल्या अण्णासाहेबांच्या अडचणीचे निराकरण ह्या दोन प्रतिष्ठित मंडळींनी केले.


१९२० साली कुटुंबातील आणखी दोन व्यक्तींच्या मृत्यूचे दुःख अण्णासाहेबांना सहन करावे लागले. १९२० सालच्या प्रारंभी ताबूत स्ट्रीटमधून मिशनच्या काही शाळा नव्याने बांधकाम चाललेल्या मिशनच्या भोकरवाडीतील इमारतीत नेण्यात आल्या होत्या. मिशनच्या इमारतीच्या बांधकामाची धमाल गर्दी चालली असतानाच अण्णासाहेबांच्या घरी त्यांच्या धाकट्या बहिणीच्या मृत्यूची दुःखद घटना घडली. त्या सुमारास अण्णासाहेब ताबूत स्ट्रीटवरील मिशनच्या शाळेत राहत होते. ३ जानेवारी १९२० रोजी पहाटे तान्याक्का ऊर्फ सौ. मुक्ताबाई काळे ह्यांच्या मृत्यू झाला. गावात आणि लष्करात ही बातमी पसरल्यावर स्मशानयात्रेसाठी ब्राह्मण, मराठे, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी जातींतील माणसांची गर्दी लोटली. अस्पृश्यांची तर विशेष गर्दी होती. भजनीमंडळांनी भजन सुरू केले. प्रेतास खांदा कोणी द्यावा या प्रकारची कुजबूज व हलक्या आवाजातील पृच्छा सुरू झाली, तेव्हा अण्णासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले, “ही बहीण माझीच नव्हे, तर सर्वांची आहे . हिने अखेरपर्यंत महारा-मांगांची सेवा केली आहे. म्हणून आपण कृतज्ञपणे इतके जमले आहात. ज्यांच्या मनात असेल तर त्याने निःशंकपणे प्रेतास खांदा द्यावा.” प्रेतयात्रा निघाल्यानंतर अस्पृश्यांसह सगळ्या जातीचे लोक भराभर आळीपाळीने खांदा देऊ लागले. बुधवार चौकीत प्रेतयात्रा आल्यानंतर सेठ त्रिकमदास यांना अण्णासाहेब शिंदे यांची बहीण वारल्याचे कळले. हे राष्ट्रीय वृत्तीचे गृहस्थ सामाजिकबाबतीत कर्मठ होते व स्मशानभूमीचे प्रमुख ट्रस्टी होते. स्मशानभूमीमध्ये सौ. मुक्ताबाईंचे प्रेत जाळण्यासाठी कुणी आडकाठी करू नये म्हणून तत्परतेने पुढे लकडी पूलावरील स्मशानभूमीमध्ये गेले. श्री. पां. नं. भटकर यांच्या संपादकत्वाखाली त्या वेळी निघणा-या मूकनायकमध्ये ह्या दुःखद घटनेसंबंधी पुढील वृत्त आले आहेः “आम्हांस कळविण्यास वाईट वाटते की, रा. विठ्ठल रामजी शिंदे या पुण्यात्म्याची धाकटी बहीण सौ. मुक्ताबाई काळे यांना तारीख ३ जानेवारी रोजी पुणे येथे देवाज्ञा झाली. निराश्रित साह्यकारी संस्थेच्या कामी आत्म्यज्ञ करिताना या थोर विभूतीस घरदारची कोणीही माणसे पुरली नाहीत हे काम शिरावर घेतल्यापासून विश्वासाचे घर म्हणून ज्या काही थोड्या व्यक्तींवर रा. शिंदे यांना विसंबून राहणे प्राप्त झाले त्यांपैकी कै. मुक्ताबाई आपल्या बंधूंचे साह्म करण्यास फार उपयोगी पडल्या.


“बाईंची प्रेतयात्रा अगदी अपूर्व आणि संस्मरणीय अशी झाली. त्यांच्या प्रेतयात्रेस जुन्या-नव्या मताचे मराठे, ब्राह्मण, महार, मांग, चांभार, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी तसेच शिक्षित, अशिक्षित, श्रीमंत आणि गरीब अनेक जातींच्या व दर्जाच्या लोकांची गर्दी झाली होती. एवढेच नव्हे तर जातधर्म किंवा उच्चनीच हा भेदभाव न ठेवता अस्पृश्यवर्गातसुद्धा सर्व लोकांनी प्रेतांस खांदा दिला. हिंदू धर्माच्या किंवा हिंदुस्थानच्या इतिहासातील असा हा पहिलाच प्रसंग असावा. बाईंच्या पुण्याईने स्मशानातही कोणी रोखले नाही. उलट पुण्यासारख्या ठिकाणी हिंदूंच्या स्मशानभूमीत अस्पृश्यवर्गाची प्रेते नेण्याची बंदी काढून इहलोक सोडताना हे महत्कार्य करून त्या कृतार्थ झाल्या. रा. शिंद्यांना तर हा महोत्सवच वाटून ते आपल्या कर्तव्याचे प्रधान अंगच आहे अशा सदभावनेने संतोषच झाला आहे. बाईंच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. रा. शिंदे यांच्या ह्या अभंगव्रताचे कोणी मानकरी होतील काय?”१ मूकनायकाचे त्या वेळचे संपादक पां. नं. भटकर हे मिशन बोर्डिंगचे विद्यार्थी होते. ते अण्णासाहेबांच्या सर्व कुटुंबीयांना ओळखणारे व त्यांच्या वृत्ती व हेतू जाणणारे होते. ते स्वतः अस्पृश्यवर्गातील असल्यामुळे स्मशानभूमीवरील अस्पृश्यांचा प्रवेश ह्या घटनेचे सामाजिकदृष्ट्या ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच अशा प्रकारची प्रतिक्रिया ह्या स्फुटातून प्रकट केली आहे. मुक्ताबाई काळे ह्या अतिशय साध्या, भोळ्या, मिशनचे काम निष्ठेने करणा-या व सर्वांशी प्रेमाने वागणा-या होत्या, म्हणून त्यांना ओळखणा-या सगळ्यांना त्यांच्या मृत्यूचा चटका लागला. श्री. वामनराव सोहोनी यांनी अण्णासाहेबांना जे सांत्वनपर पत्र पाठवले त्यामध्ये मुक्ताबाईंच्या स्वभावाचे व कामावरील निष्ठेचे यथार्थ वर्णन केले आहे.


यानंतर अण्णासाहेबांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनावर दुसरा मृत्यूचा आघात झाला तो म्हणजे त्यांच्या चिमुकल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचा. मुक्ताबाईंच्या मृत्यूनंतर लवकरच मिशनच्या शाळा भोकरवाडीतील नवीन इमारतीत गेल्या. राहण्यासाठी बांधलेल्या जागा व वसतिगृहाच्या इमारती कशाबशा पूर्ण झाल्या होत्या. पण भिंती व गिलावा नीट सुकलेला नव्हत. फरशा व दारे-खिडक्या बसवण्याचे काम घाईने चालूच होते. इमारत ओलसर अवस्थेत असतानाच अण्णासाहेबांनी कुटुंबीयांसह तेथे जाऊन राहावे लागले. भोवतालची साफसफाई चालू होती. ह्या वेळी अण्णासाहेबांची एकुलती एक धाकटी मुलगी चार वर्षांची होती. अण्णासाहेबांना मुलींची आवड फार. त्यातून ही चिमुकली मुलगी दिसण्यास सुंदर व चरूचरू बोलणारी होती. इमारतीचे बांधकाम करणा-या अस्पृश्य मजुरांमध्ये ती खेळीमेळीने हिंडत असे. त्यामुळे मजुरांमध्येही ती प्रिय झालेली होती. तिच्या चुणचुणीतपणामुळे अण्णासाहेबांची ती फार लाडकी होती. दिवसभर ती ओल्या इमारतीतून हिंडायची व उन्हातही वावरायची. त्या कारणाने तिची प्रकृती बिघडली व तिला मॅनिंजायटिस ह्या नावाचा मेंदूचा विकार झाला. अण्णासाहेबांनी सतत एक महिना तिल मांडीवर घेऊन अहोरात्र तिची शुश्रुषा केली. वास्तशांती न करता अण्णासाहेबांचे कुटुंबीय तेथे राहावयास गेले म्हणून बाधा झाली असे भेटीस येणा-या अशिक्षित बायका म्हणू लागल्या. त्या त्याच धर्तीचे उपाय त्यांना सुचवीत असत, परंतु अशा गोष्टींवर अण्णासाहेबांचा विश्वास नव्हता. भोवतालच्या दूषित वातावरणामुळे त्या लहान मुलीला आजारपण आले असेच त्यांना वाटत होते. शेवटी ६ जून १९२० रोजी ह्या चिमुकल्या जीवाचा अंत झाला. ‘घरचा बळी घेऊन वास्तुशांती झाली’ असे वारंवार म्हणत अण्णासाहेबांच्या पत्नी सौ. रुक्मिणीबाई शोक करू लागल्या.२ मिशनमध्ये काम करणारे मजूर आणि तेथे राहणा-या सगळ्या मंडळींच्या मनाला ह्या चिमुकल्या जीवाच्या मृत्यूने फार चटका लावला. अण्णासाहेबांनी तर मुलींची फार हौस होती. आपल्या एकुलत्या एका मुलीच्या निधनाचे अण्णासाहेबांना अतोनात दुःख झाले.


संदर्भ
१.    मूकनायक, १४ फेब्रुवारी १९२०.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३०५.

  1. काठेवाडचा दौरा
  2. काँग्रेसमध्ये अस्पृश्यतानिवारणाचा ठराव
  3. ऑक्सफर्डमधील शेवटची टर्म
  4. ऑक्सफर्डमधील पहिले दोन महिने
  • 118
  • 119
  • 120
  • 121
  • 122
  • 123
  • 124
  • 125
  • 126
  • 127
Page 123 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी