1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

स्वाशय निवेदन*

(महर्षी शिंदे यांचे एक प्रकट निवेदन)

आज दुसरीकडे निराश्रित साहाय्यकारक मंडळीचे चिटणीस व मंडळीची स्थापना करणारे रा. विठ्ठल रामजी शिंदे व मुंबईच्या शाखेचे चालक रा. वामनराव सोहोनी यांचे अस्पृश्यांच्या उच्च शिक्षणासंबंधाचे लेख आम्ही प्रसिध्द केले आहेत; ते वाचकांनी अवश्य लक्षपूर्वक वाचावेत; म्हणजे संस्थेसंबंधाने विनाकारण गैरसमज माजवून काही परोपकारी गृहस्थ कसा नुसता घोटाळा उत्पन्न करीत आहेत, त्याची चांगली कल्पना आल्यावाचून राहणार नाही.

एका गृहस्थाचे तर असे म्हणणे आहे की, अस्पृश्यांमध्ये जी जागृती होत आहे ती आपल्या सर्वस्वास घातक आहे असे वाटून अस्पृश्यांना दाबात ठेवण्याचा प्रयत्न मंडळीकडून होत असतो व ही जागृती आम्हासही सहन होत नाही.  निराश्रित साहाय्यकारक मंडळी स्थापन झाल्यापासून अनेक प्रसंगी आम्ही असे प्रतिपादिले आहे की, अस्पृश्य मंडळींनी अंती आपला स्वतःचा उध्दार आपणच करून घ्यावयाचा आहे.  निराश्रित साहाय्यकारक मंडळीचे प्रयत्न हे कुबडयांच्या साहाय्याने चालण्यासारखे आहेत.  स्वतःच्या पायावर ह्या लोकांनी उभे राहिले पाहिजे.  आठ वर्षांपूर्वी एका विशेष प्रसंगी आम्ही जे* उद्गार काढले ते ह्या पुढे दिले आहेत.  त्यावरूनही आमच्या धोरणाची कल्पना कोणासही होण्यासारखी आहे.  आमच्या अस्पृश्य मानिलेल्या बंधूंनी आत्मोध्दाराचे प्रयत्न स्वतः करणे हेच इष्ट आहे.  पण त्यासाठी जी इतर माणसे थोडेबहुत कार्य करीत आहेत, त्यावर बोळा फिरविण्याची व त्यांच्यापैकीच एकाची तेवढी पूजा करण्याच काही आवश्यकता नाही.  म्हणून आम्ही पुन्हा एकवार म्हणतो की, क्षेत्र फार मोठे आहे, निराश्रित साहाय्यकारक मंडळी आपल्या सामर्थ्यानुसार प्रयत्न करीत आहे.  ज्यांना निराळया दिशेने कार्य करण्यात आपले हित आहे असे वाटत आहे त्यांनी ते साधावे.  सर्व अस्पृश्य मंडळीचा उध्दार निराश्रित साहाय्यकारक मंडळी कशी करणार ?

-----------------------------------------------------------------------------------

*सुबोधपत्रिका, १९१२
*''आज उच्च वर्णाच्या लोकांनी नीच मानिलेल्या जातीचापक्ष जो घेतलेला आहे तो त्यांच्यामध्ये जागृती उत्पन्न करण्यासाठी, त्यांना मार्ग दाखविण्यासाठीच होय हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.  अस्पृश्यांनी आपला स्वतःचा आपणच उध्दार केला पाहिजे.  स्वतः त्यांनी आपल्या पायावर उभे राहू लागले पाहिजे असे आम्ही आजपर्यंत पुष्कळ वेळा म्हटले आहे.  परंतु ही मंडळी स्वतः थोडी चळवळ करू लागली की, तीस प्रारंभच उच्च वर्णाच्या द्वेषाच्याद्वारे होत असतो, हे जे एक नवीनच निघ्न उपस्थित होते ते त्यांच्या उध्दाराच्या चळवळीत उच्च वर्णाचे लोक असले म्हणजे कमी प्रमाणाने भासेल असा आमचा समज आहे; असा आमचा अनुभव आहे.  इतरांच्या द्वेषाच्या द्वारे स्वतःची उन्नती होत नाही, हे तत्त्व स्वत्वाचे वारे अंगी संचरत लोकांवर बिंबविण्याचा हाच एक मार्ग आहे, असे आम्हांस वाटते.

दुसरी एक खेदाची गोष्ट आम्ही अशी अनुभवली आहे की, अस्पृश्यवर्गातील काही मंडळी पुढे गेली म्हणजे मग आपल्या मागासलेल्या बंधूंची त्यांना आठवण पडत नाही.  ते आपल्यापैकीच आहेत हे ते विसरतात व त्यांची उन्नती करण्यासाठी झटणारास हातभार लावणे, नव्हे ते काम आपलेच आहे, अशी त्यांच्या ठिकाणी जागृती राहत नाही.  हा एक कष्टप्रद अनुभव आहे.  आणि पुढे गेलेल्यांमध्ये मागे राहिलेल्यांच्या संबंधाने जागृत सहानुभूती कशी उत्पन्न करता येईल, हा फार महत्त्वाचा प्रश्न नीच मानिलेल्या जातींची कळकळ बाळगणारांपुढे आहे.''

सामाजिक स्थिती

प्रकरण दहावे

'परदुःख शीतळ' ह्या चोखदार म्हणीचे मर्म मानीव अस्पृश्यांच्या आजच्या समाजस्थितीची अळकळ करताना फार चांगले ध्यानात भरते.  पुष्कळ सहृदय पण वरवर विचार करणाऱ्या माणसांना, किंबहुना खोल विचार करणाऱ्या पण अनेक व्यवहारांच्या दगदगीत गुंतलेल्या मुत्सद्दयांना अलीकडे असे वाटणे अगदी सहज आहे की, अस्पृश्यांचा प्रश्न प्रथमदर्शनी वाटतो तितका उग्र आणि तळमळीचा आता उरला नाही.  चहूकडे चाललेल्या केवळ अस्पृश्यतानिवारक प्रयत्नांमुळेच नसले तरी, उल्लीच्या सार्वजनिक हालचालीमुळे जग जे सहजच पुढे ढकलले जात आहे, त्या धकाधकीत अस्पृश्यांची स्थिती आता पूर्वीप्रमाणे घोर कष्टमय उरली नाही.  काही भावनामय सुधारकांचे तर, 'ह्या जुन्या जुलुमाचा अलीकडे उगाच बाऊ करून ठेविला आहे, तिकडे आता कमी लक्ष दिले तरी चालेल.'  वगैरे अभिप्राय व उद्गार अलीकउे उघड उघड ऐकू येत आहेत.  अशा परदुःख-शीतळांना जगातले कोणतेही दुःख, मग ते सामाजिक असो की व्यक्तीचे असो, अगदी हलकेच वाटणार !  उलटपक्षी एखाद्या उदासीन विरक्ताला अगर मायावादी वेदांत्याला तरी ह्या गोष्टीची कशी तळमळ लागणार आहे ?  फार तर काय, स्वतः अस्पृश्य जनतेचा असा एक भला मोठा भाग, ह्या अवाढव्य देशाच्या कानाकोपऱ्यात, किंवा जागृतिहीन निश्चल प्रदेशात असा खुशाल वावरत आहे की त्यालाच आपल्या स्वतःच्या हीन स्थितीची जाणीव नाही !  मग अस्पृश्यांच्या प्रस्तुत स्थितीची योग्य अजमावणी, वर निर्दिष्ट केलेल्या भिन्न प्रकारच्या धन्य पण अपवादक व्यक्तींना कधीच होणे शक्य नाही. मानवी जीविताचे ध्येय काय, सुधारलेल्या जगाची मजल आज कोठवर गेली आहे, आणि ह्या जागतिक सुधारणेत स्वतः हिंदुस्थानाने मागे किती कर्तृत्व बजावले आहे व पुढे किती बजावयाचे आहे, ह्या सर्व पूर्वापार वृत्तांताचा आढावा घेऊन, आजही हिंदू समाजाचा केवढा मोठा भाग हीन दीन स्थितीतच दबून गेला आहे; ह्याची पूर्ण जाणीव करून घेणे आमच्या खऱ्या पुढाऱ्यांना अगदी जरूर आहे.  ती जाणीव होईपर्यंत अस्पृश्यांच्या आजच्या समाजस्थितीची योग्य अजमावणी शक्य नाही, हे खास.

ह्या दुसऱ्या खंडाच्या पहिल्या प्रकरणात अस्पृश्य जातींच्या संख्या देताना स्वच्छ आणि अस्वच्छ असे दोन भेद केलेले आहेत.  त्यांवरुन दिसेल की सर्वच अस्पृश्य अगदी ओंगळ आणि हीन दशेत आहेत असे नाही.  बंगाल्यातील नमःशूद्र व राजबंशी आणि मलबारातील येझवा अथवा तिय्या या जाती इतरांच्या मानाने राहणीने स्वच्छ, खाऊन पिऊन सुखी, इतकेच नव्हे, तर आत्मोध्दाराच्या मार्गाने झपाटयाने चाललेल्या आहेत.  पण त्यांच्यावरही अद्यापि निरर्थक सामाजिक बंधने आहेत व त्यांनाही पदोपदी अपमान सहन करावा लागतो; त्यामुळे त्यांच्या जागृत झालेल्या मनाला तीव्र वेदना होतात, की ज्या अज्ञानांधकरात सुखी झोपलेल्या इतर हीन जातींना होणे शक्य नाही.  हीनता नाही तेथे टोचणी आहे, टोचणी नाही, तेथे गाढ हीनता आहे.  पण हे दोन्ही भाग अपवादच होत.  ह्या दोघांमध्ये असणारा जो बहुसंख्याक अस्पृश्यवर्ग; त्यात हीनता आहे आणि टोचणीही आहे.  म्हणून एकंदर मानीव अस्पृश्य समुदाय प्रबुध्द भारताच्या विचाराचा व प्रयत्नांचा सतत विषय असणे जरूर आहे.  असे नसेल तर स्वतः भारतच प्रबुध्द नाही; म्हणून तोच समग्र नष्ट होण्याला योग्य आहे, असेच म्हणणे क्रमप्राप्त होईल !

अस्पृश्यांचे विद्वान आणि कर्तृत्ववान पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर ह्यांनी लोदियन फ्रँचाईस कमिटीचे एक सभासद ह्या नात्याने, तिचे रिपोर्टाला आपली एक स्वतंत्र मतपत्रिका जोडली आहे.  (पुस्तक १ ले पान २०४ पहा.)  तिच्यात त्यांनी बिहार आणि ओरिसा प्रांतांच्या इ.स. १९२१ सालच्या खानेसुमारीचे सुपरिंटेंडेंटचा एक मार्मिक उतारा दिला आहे.  त्यातले पुढील एक वाक्य विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.  "But because the facts of every-day life make it impossible to follow the same practical rules as were followed a hundred years ago, it is not to be supposed that the distinctions of pure and impure, touchable and untouchable, are no longer observed;..."  ह्यानंतर डॉ. भीमराव स्वतःचे मत देतात - आणि ते निराळया टाइपात छापले आहे - ते असे :  "If this is a correct statement of facts of life, then the difference between untouchability in its literal and notional sense is a distinction which makes no difference to the ultimate situation; for as the extrract shows, untouchablitiy in its notional sense persists even where untouchability in its literal sense has ceased to obtain.  This is why I insist that the test of untouchability must be applied in its notional sense."

हाच अभिप्राय अधिक स्पष्ट करून दाखविणे जरूर आहे.  आजकाल व्यवहाराच्या जरुरीमुळे अगदी जुन्या मताचे पुरुषच नव्हेत, तर बायकाही बाजारात, यात्रेत कचेऱ्यांतून व आगगाडीतून अस्पृश्यांशी मिसळतात.  घरी आल्यावर स्नान करून शुध्द होतात किंवा होतही नाहीत.  तरी अशा व्यवहारांचे प्रसंग नसताना ते अस्पृश्यांशी कधी मिसळणार नाहीत हे उघड आहे.  कारण त्यांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना कायमच असते.  कितीही जुन्या वळणाचा माणूस असला तरी कोणत्याही स्पृश्य जातीशी भेटीव्यवहार करण्यास तो कचरत नाही.  परंतु अस्पृश्यांना भेटण्याचा प्रसंगच आला तर स्पृश्य जातीतील माणसे मनातून तरी कचरतील व त्याबाबतीत शक्य तितकी टाळाटाळ करतील.  ह्यावरून अस्पृश्यतेची गोम बाहेरील वागणुकीवर नसून मनातील समजुतीवरच अवलंबून आहे हे सिध्द होते.  आज इंग्रज सरकारच्या तुरुंगातील कैद्यांच्या भोजनाव्यवहारात जातिभेद कोठे, केव्हाच पाळला जात नाही.  पण आज शेकडो वर्षे हा तुरुंगातील अभेदभाव चालूनही तेवढयावरूनच तुरुंगाबाहेरील जातिभेद कमी झाला, असे मानणे असे समर्थनीय होणार नाही, त्याचप्रमाणे आगगाडींतून, बाजारांतून, प्रत्यक्ष हॉटेलातूनही अस्पृश्यांशी स्पृश्य मिसळतात, म्हणून तेवढयावरूनच अस्पृश्यता नाहीशी झाली किंवा तिची तेढ व्हावी तितकी कमी झाली, असे मानणेही समर्थनीय होणार नाही.  अस्पृश्यतेची समजूत, तिची तळमळ, मनाच्या तळाशी दडून बसली आहे, तोपर्यंत ती केव्हा कशी बाहेर फुटून येईल, ह्याची खात्रीच धरवत नाही.  फार तर काय, सुधारकांनी आणि देशभक्तांनी एखाद्या एम. सी. राजांना किंवा आंबेडकरांना मोठया सार्वजनिक सन्मानाने एखाद्या ब्राह्मणसभेच्या मंदिरात बरोबर जेवणास घेतले, तरी सिध्द काय होते की इतर पुष्कळ जुनी जनता त्यांना बरोबर घेऊन जेवायला तयार नाही हेच !  एरवी असले समारंभ झालेच नसते; कारण त्यांची जरुरीच नसती !  ह्यावरून मी अशा सुधारणेचे महत्त्व कमी मानतो असे मुळीच नव्हे.  माझे म्हणणे एवढेच की, रोगी औषध आनंदाने घेतो; आणि औषध गुणकारी आहे, एवढयावरून रोगच उरला नाही असे समजण्याची दिशाभूल स्वतः सुधारकांचीच केव्हा केव्हा होण्याचा संभव आहे.  मग ज्यांना अशा सुधारणेची दगदग करावयाचीच नसते त्यांच्या तर्कटाला किती ऊत येईल ह्याची नुसती कल्पनाच करणे बरे !


कुणबाऊ गुलामगिरी

असो.  आजकालच्या जगाच्या सुधारलेल्या स्थितीतही हिंदुस्थानातील अस्पृश्यांची निरनिराळया दिशेने कशी हलाखी चाललेली आहे, ह्या विषयींच्या काही बाबींचा केवळ उदाहरणार्थ विचार करू.  अस्पृश्यतेच्या लक्षणांपैकी एक मुख्य लक्षण म्हणजे अस्पृश्यजन हा एक जमिनीवरचा परंपरागत गुलाम आहे; त्याची ती गुलामगिरीच होय.  ही शेतकरी गुलामगिरीची परंपरा द्राविड देशांत विशेषतः नंबुद्री ब्राह्मण आणि नायर जमीनदारांच्या दडपशाहीमुळे मलबार प्रांतात अद्यापि फारच कष्टप्रद आहे.  ह्या गुलामगिरीचे मूळ दोन ऐतिहासिक कारणांत आहे.  ती कारणे म्हणजे एक नायरांची मुलुखगिरी आणि दुसरी नंबद्रींची जमीनदारी.  नायर लोकांनी जेव्हा मलबार प्रांत पादाक्रांत केला व ते आपण राजे बनले, तेव्हा त्यांनी तेथील मूळचे जमिनीचे मालक पुलया, चेरुमा, नायाडी, इत्यादी जातींना त्यांच्याच जमिनीवर वंशपरंपरेचे राबणारे गुलाम केले.  जमिनी काबीज केल्या तरी वाहण्याला मजूर पाहिजेच होते.  ह्या नवीन राजकीय कैद्यांपेक्षा अधिक चांगले फुकटे मजूर दुसरे कोण मिळणार ?  आजकाल आसाम, सिंहलद्वीप वगैरेकडील गौरकाय चहाच्या मळेवाल्यांना आपल्या बादशाही सत्तेमुळे जसे मुदतबंदी मजूर ऊर्फ गुलाम मिळतात तसेच पुरातन काळच्या नायरांना हे आयते मजूर अधिक सवलतीने मिळाले.  हल्लीच्या चहाच्या मळयांतून मजुरांना गुरांप्रमाणे वागविण्यात येते; त्यांची दाद सहजासहजी लागणे शक्य होत नाही.  त्याचप्रमाणे नायर राजांच्या कारकीर्दीत ह्या गुलामांची स्थिती होती.  त्या वेळी एखाद्या साध्या नायर शिलेदाराने एखाद्या चेरुमाचा करमणुकीखातर जरी प्राणही घेतला, तरी चालत असे, असे तद्देशीय गॅझेटियरमधून उल्लेख आढळतात !  रावांचा रंकांवर, थोडक्या शतकांपूर्वी असा दरारा पाश्चात्त्य सुधारलेल्या देशांतही चालत असे, मग मलबारात अशा गोष्टींचा पुरावा शोधण्याची जरुरीच नाही.  चेर देश हा मूळचा चेरुमांचाच.   हे त्यांच्या नावावरूनच सिध्द होते.  पण तो आज आपल्या मायभूमीत आपणच बंदा गुलाम झाला.  कालांतराने मलबारात नंबुद्री ब्राह्मणांकडून आपला धार्मिक ताबा स्थापण्यात आला.  आता बहुतेक जमीन नंबुद्रीची अशी रूढी झाली आहे.  चोरावर मोर असा हा न्याय आहे !  ह्या राजकीय धार्मिक जोडपकडीला ब्रिटिश रियासतीच्या छत्राखाली भांडवलशाहीचा तिसरा पाठिंबा मिळाला आहे.  ब्रिटिश सत्ता म्हणजे भांडवलशाहीची इष्टदेवताच.  मग मलबारातील कुणबावा कसा चालत असेल ह्याची कल्पनादेखील सहज होणे कठीण.  मलबारातील जमीनदार नंबुद्री ब्राह्मण झाल्यावर कुणबी ऊर्फ जमिनी वाहणारे हे नायर किंवा तिय्या जातीचे झाले आहेत.  पण त्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष देह झिजविणारी जनावरे म्हणजे मूळ मालक 'चेरुमा' हेच आहेत.  जमिनीवरच तात्पुरत्या झोपडया बांधून हे चेरुमा वंशपरंपरेने असतात.  एखाद्या जमिनीची विक्री अगर मोबदला झाला तर त्या जमिनीवरची झाडे, दगड, माती, निधी, निक्षेप ह्यांचीसुध्दा जशी विक्री अगर बदला झाला असेच समजण्यात येते, तसेच ह्या जमिनीवरील झोपडया आणि त्यात राहणाऱ्या मानवी जनावरांचाही सहकुटुंब मोबदला होतो.  ते नव्या मालकाचे कायदेशीर ताबेदार होतात.  त्यांनी ह्या नव्या मालकाविरुध्द काही हलगर्जीपणा केला, तर आजकालचा सुधारलेला ब्रिटिश कायदादेखील तात्त्वि न्यायापेक्षा व्यावहारिक रूढीच्या बाजूलाच अधिक कलतो.  हे सर्व प्रकार तेथे जाऊन बारकाईने आणि सहानुभूतीने निरीक्षण केल्याशिवाय कळून येणे शक्य नाही.

मी एकदा ब्रिटिश मलबारात फिरतीवर असताना कालीकत येथे रारीचन मुप्पन नावाच्या एका श्रीमंत नायर मित्राकडे पाहुणा म्हणून उतरलो होतो.  चेरुमा जातीची पुष्कळ पिढीजाद मजूर कुळे त्याच्या इष्टेटीवर शेकडो होती.  आमच्याकडील शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या शेतावर आपल्या बैलांना औताचे काम नसेल तेव्हा दुसऱ्याच्या शेतावर किंवा इतर कामावर आपले बैल भाडयाने देतात, तसे हे राजश्री मुप्पन् आपल्या ताब्यातल्या मजुरांना आपले काम नसेल तेव्हा दुसरीकडे भाडयाने पाठवीत व त्यांचे भाडयाने उत्पन्न खुशाल आपण घेत.  ही गोष्ट त्यांनीच प्रांजलपणे मला सांगितली !  ह्या गुलामांच्या योगक्षेमाची व्यवस्था ज्या रूढीमुळे ह्यांच्या मालकी घराण्याकडे आली होती, त्याच रूढीच्या जोरावर ह्या प्राण्यांच्या कष्टाचे उत्पन्न ह्या मालकाकडेच येणे क्रमप्राप्तच होते.  मग हा व्यवहार ऐकून मला आश्चर्य का वाटावे ह्याचेच उलट कोडे रा. मुप्पन् ह्यांना पडले !  थोडयाच चौकशीनंतर चेरुमांचा कायदेशीर दर्जा मला कळला व माझी हळहळ मिटली !  नाइलाजाची खात्री पटल्यावर व्यर्थ हळहळ काय उपयोगाची !

अशा गुलामाचे भाडेच काय, पण रीतसर खरेदीपत्र करून अशा गुलामाची विक्री झाल्याबाबतचा एक खटला स. १९१४ साली झालेला मी वर्तमानपत्रात वाचला.  असोशिएटेड प्रेसची खालील अर्थाची तार मी वाचली.  उत्तर मलबारात क्विलांडी जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेटपुढे हा खटला सुनावण्यात आला.  पलचेरूवट महमद व कोरोथ महमद नावाचे दोन श्रीमंत मोपले गृहस्थ होते.  पहिल्याने दुसऱ्यास वेलन् नावाच्या आपल्या ताब्यातील चेरुमा जातीच्या दासाला (Serf) अवघ्या दहा रुपये किमतीला विकले.  सुमारे दोन वर्षांनी मालकाच्या जुलुमाला कंटाळून वेलन् हा पळून गेला.  तो परत मिळावा म्हणून कोरोथने पलचेरूवटवर ही फिर्याद जिल्ह्याच्या मुनसफाकडे केली.  तेव्हा कोठे ब्रिटिश कायद्याचे डोळे उघडले.  मुनसफांनी अर्थात हा विक्षिप्त दावा काढून तर टाकिलाच.  पण हे प्रकरण कागदपत्रांसह पोलीस चौकशीसाठी मॅजिस्ट्रेटकडे पाठविण्यात आले.  कारण मनुष्यविक्रीचा फौजदारी गुन्हा घडल्याचा पुरावा मिळाला, वगैरे वगैरे.  सुमारे ७५ वर्षांपूर्वी गुलामगिरीचा कायदा हिंदुस्थानात पास झाला असूनही त्या वेळी मलबारात हा क्रयविक्रय इतक्या उघड रीतीने - कदाचित नकळत - चालावा हाच मुद्दा मुख्य आहे.  शिमगा संपला तरी कवित्व उरते, ह्या न्यायाने गुलामगिरी कायद्याने बंद झाली, तरी अद्यापि ह्या बिचाऱ्यांची ताबेदारी कोणत्या ना कोणत्या रूपाने तरी त्यांच्या स्वातंत्र्याच्या, सुखाच्या व प्रगतीच्या आड येत आहेच. वर सांगितलेल्या जमीनदारीच्या जुलुमात सावकारी जुलुमाची पुनः अधिक भर पडते.  कर्नल ऑल्कॉट ह्यांनी आपल्या Poor Pariah ह्या पुस्तकात (पान ५ पहा) एका मासलेवाईक कर्जरोख्याचा उतारा दिला आहे.  ह्याची तारीख २२ मे १९०० ही दिली आहे.  हा रोखा रंग सैदिनी पदयाची नावाच्या सावकाराला इरुला मोट्टयार नावाच्या पारिया कुळाने लिहून दिला आहे.  तो अशा अर्थाचा आहे : ''तुमचे वडील नारायणस्वामी ह्यांनी आम्हांला ६८ रुपये कर्जाऊ दिले म्हणून आजवर मी स्वतः आणि माझी तीन मुले, वडील मुलगा पेरिआप्पल (वय १९ वर्षे), मधला चिन्न अप्पयल (वय १२ वर्षे), धाकटा चिन्न स्वामी (वय ९ वर्षे) सदर नारायणस्वामीची करीत आलो.  तुमच्या वडिलांनी आपल्या मागे तुमच्या हवाली आम्हांला केले आहे, म्हणून आणखी दोन वर्षे आम्ही चौघांनी तुमची नोकरी केली.  वरील तारखेच्या नंतर तुमच्या वडिलांकडून व स्वतःकडून आम्हांला आणखी लहान लहान रकमा कर्जाऊ मिळून, एकंदर मुद्दल आजवर ९३ (रुपये त्र्याण्णव) झाले आहे.  ह्याच्या व्याजात मी, माझी पत्नी, माझी तीन मुले मजुरी घेऊन वरील मुद्दल फिटेपर्यंत नोकरी करीत राहू.  नोकरी करण्यात कसूर होईल तर वरील रकमेची फेड करू. निशाणी हाताचा अंगठा'' ह्या शतकातही असे कर्जरोखे सर्व कुटुंबास गहाण ठेवून त्यांच्या तारणावर लिहून घेतले जात आहेत हाच मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.  ह्याहून आश्चर्य हे की, असले कर्ज पिढयानुपिढया फिटत नसते.  असले रोखे अलीकडे कमी झाले असले तरी हा मासलेवाईक हवालदीलपणा अजीबात नष्ट झाला आहे, असे नाही.  इ.स. १९१९ साली मद्रास इलाख्यात तंजावर त्रिचनापल्लीकडे जमीनदार आणि कुळे ह्यांच्यामध्ये कटकट उत्पन्न झाली होती म्हणून मी आमच्या मिशनच्या बंगलोर शाखेच्या सुपरिंटेंडेंटला बरोबर घेऊन हे प्रकरण स्वतः पाहून काही इलाज घडत असल्यास पाहावे म्हणून गेलो.  त्या वेळी लॉर्ड पेंटलंड हे मद्रासचे गव्हर्नर होते.  त्यांनी अस्पृश्यवर्गाच्या हिताकरिता लेबर ऑफिसर म्हणून एक खास अधिकारी नेमला होता.  जमिनीचा मालकी हक्क अस्पृश्यांना नव्हता, म्हणून त्यांना काही जमिनी खास मालकी हक्काने करता याव्या म्हणून त्यांना काही पड जमिनी अस्पृश्यांचया वहिवाटीला देण्याकरिता मद्रस सरकारकडून राखून ठेवण्यात आल्या होत्या.  अस्पृश्यांना हे हक्क प्राप्त झाल्यास मोठी आपत्ती घडेल ह्या भीतीने ह्या जिल्ह्यातील जमीनदारांनी मोठाच गिल्ला चालविला होता.  मद्रासेस प्रत्यक्ष गव्हर्नर साहेबांनी गाठ घेऊन त्यांची सहानुभूती संपादून आम्ही दोघे ह्या जिल्ह्यात गेलो.  त्याच वेळी हिंदू-मुसलमानांची राष्ट्रीय एकी घडविण्यासाठी 'लखनौ पॅक्ट' लो. टिहकांनी घडवून आणिला होता.  आणि पुणे-मुंबई येथे मी आणि आमच्या मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर ह्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्य ह्यांची एकी घडविण्यासाठी मोठमोठया जंगी जाहीर सभा भरवून अस्पृश्यांची जोड राष्ट्रकार्याला व राष्ट्रीय सभेची जोड अस्पृश्योध्दाराला मिळविण्याचा प्रयत्न चालविला होता.  पण काही झाले तरी आम्ही वरील चौकशी करण्याकरिता त्रिचनापल्लीकडे गेलो असता, तेथील जमीनदारांनी आमच्या जीवालाच धोका येईल अशा धमक्या दिल्या, आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यातील आमच्या काही पुढारी मित्रांनी तर ज्या खेडयांतून हे रण माजले होते तेथपर्यंत आम्हाला जाऊच दिले नाही !  आमच्या सुरक्षितपणाचा प्रश्न कसाही असो (त्याविषयी प्रत्यक्ष गव्हर्नर साहेबांनी आश्वासन दिले होते तरी), आमच्या जाण्याने स्वतः अस्पृश्यांच्या हितालाच अपाय घडेल व त्यांच्या बाजूने जो प्रयोग सुरू झाला होता त्यालाच मोठी खीळ पडेल, हा पोक्त सल्ला आम्हांला ऐकणे भाग पडले.  आम्ही परत फिरलो.  कार्यबाहुल्यामुळे पुन्हा इतक्या दूर जाणेच झाले नाही.  ही मोठी नामुष्कीची गोष्ट झाली ! ह्या दक्षिण देशात अस्पृश्यवर्गातून ख्रिस्ती धर्मात मोठी प्रचंड भरती झाली आहे हे प्रसिध्दच आहे.  खेडयांत ह्या लोकांची वर सांगितलेली दैना; तर शहरात आम्हांस काय प्रकार प्रत्यक्ष ख्रिस्ती झालेल्या पारिया लोकांचा दिसला !  त्रिचनापल्ली हे एका मोठया जिल्ह्याचे राजधानीचे शहर.  ह्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनची मोठमोठी केंद्रे आणि मंदिरे आहेत.  वरिष्ठ वर्गातून ख्रिस्ती झालेल्यांची स्थिती सुसंपन्न असून कितीतरी व्यक्ती ब्रिटिश दरबारात अधिकारारूढ दिसल्या.  पण बहुजनसमाजाची स्थिती कशी दिसली ?  एके दिवशी मी एका मोठया रस्त्याने चाललो असताना समोरून एक मोठा म्युनिसिपालिटीचा केराचा अवजड छकडा रखडत येत होता.  त्यास एकीकडे एक म्हातारा रेडा जुंपला होता व दुसऱ्या बाजूस एका तरुण मजुरानेच आपली मान लाविली होती.  मोठया करुणेने मी त्या तरुणास त्याची जात विचारली.  पण त्याने मोठया आढयतेने आपण रोमन कॅथॉलिक (ख्रिस्ती) आहोत असे सांगितले.  मला पूर्वीच आलेली शंका हे उत्तर ऐकून अर्थात तुफान वाढली.  मी धैर्य करून व अत्यंत सहानुभूतीने त्याच्या पूर्वाश्रमाची जात विचारली.  त्याने 'पारिया' असे सांगितले.  पुढे काय सांगावयाचे आहे ! बंगालकडे ब्रिटिश सरकारांनी पुढचा मागचा विचार न करिता केवळ आपली बैठक बळकट बसावी म्हणून कायम जमीनधारापध्दती रूढ केली आहे.  तेथील जमिनीची मशागत करणारा वर्ग मुख्यतः नमःशूद्र, राजबंशी, वगैरे अद्यापि अस्पृश्य असलेले वर्ग किंवा अशाच वर्गांतून मुसलमानी धर्मात शिरलेले कष्टळू, गरीब स्पृश्यवर्ग आहेत.  मद्रासेइतकी त्यांची स्थिती हताश नाही.  तरी जमीनदारवर्गांकडून शिक्षण, आरोग्य, धार्मिक व घरगुती वहिवाटीच्या नाजूक बाबतींत खेडयांत राहणाऱ्या ह्या कुळांना, उघड बोलून दाखविता येत नाही अशा प्रकारे, उपसर्ग पोचत असलेला मी त्यांच्यातच मिसळून असताना माझ्या कानांवर वारंवार येत असे.  फार तर काय, खेडयांत उकिरडा साचला तर खत म्हणून विक्री करणे, किंवा केवळ त्याची घाण आपल्या घरापासून दूर करण्याच्या बाबतीतही जमीनदाराचा दिल खूष करूनच काम होणे शक्य होत असे.  ह्यांच्यातील न्हावी, धोबी, ब्राह्मण वगैरे सर्व शागीर्दपेशा जरी पूर्वीपासून अस्पृश्य जातीचाच असला, तरी तोही मातब्बर जमीनदारांच्याच भ्रुकुटीवर नाचणारा.  नमःशूद्रासारख्या पुढारलेल्या वर्गाची जर अशी अनास्था, तर मग हारी, पान, डोम इ. अति कंगालांची स्थिती काय वर्णावी ?  पण, नंगेसे खुदा बेजार ह्या न्यायाने उलट ह्या कंगालांचीच स्थिती केव्हा केव्हा बरी म्हणवत असे !  प्रतिष्ठित नमःशूद्रांना मात्र त्यांची मानहानी अत्यंत दुःसह होत असे. आमच्या महाराष्ट्रात हाडकी-हाडोळीची क्षुद्र वतने आणि अलुत्या बलुत्याचे लहानसान हक्क महारामांगांचे आहेत.  पण अलीकडे महारांच्याच पुढाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येऊन चुकली आहे की, जोवर ह्या हक्कावर हा प्रचंड वर्ग हात टेकून आहे तोवर ह्यांचा पाय पुढे कधीच पडणार नाही.  शेत पिकलेच तर थोडे बलुते मिळणार.  पण गावकऱ्यांचा, रयतेचा, येणाऱ्या जाणाऱ्या बडया अधिकाऱ्यांच्या सरबराईचा ससेमिरा महारांच्यामागे कायमचाच लागलेला आहे.  जेथे पाच महार गावकामासाठी पुरतात, तेथे पंचवीस झाले तरी ते सर्व आपापल्या पाळीची वाट पाहत स्वस्थ बसणार !  ही स्थिती आता पालटत आहे, तरी जी एकदम बंद झाली पाहिजे, ती हळूहळू पालटत आणि लोंबकळत ठेवण्यात काय फायदा ?  परंपरेचा मोह सुटत नाही, हा अस्पृश्यांचाच दोष होय.  तेच हट्ट धरून बसतात.  त्यात सरकार आणि रयत ह्यांचा फायदाच आहे.  डॉ. आंबेडकरांनी मागे ह्या बाबतीत एक बिल आणिले होते.  पण ते कौन्सिलच्या टेबलापर्यंत पोचण्यापूर्वीच लोकांच्या हट्टामुळे मध्येच गहाळ झाले.  तूर्त अशा विधायक कार्याकडे कोणाचेच लक्ष लागणे कठीण झाले आहे.  हे महारांचे हक्क आणि त्यांची कर्तव्ये इतकी जुनी आणि त्यांनाच अवनतिकारक झाली असूनही ह्या गोष्टी त्यांच्या ध्यानात भरत नाहीत.  परकीय सरकार उदासीन असल्यामुळे, ह्या बाबतीत कायद्याच्या जोरावर सुधारणा करू इच्छीत नाही.  सरकारी अधिकाऱ्यांना ह्या बाबतीत सुधारणा होण्यात स्वतःची मोठी गैरसोय होणार हे माहीत आहे.  कारण खेडयांत फिरतीवर गेले असता - विशेषतः मुलकी आणि पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना - आपली सरबराई ह्या गरिबांकडून हल्ली थोडया मजुरीवर पण वाटेल त्या धाकदपटशाहीने करता येते.  दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे ह्या अडाणी लोकांवर एक प्रकारची पुरातन वेठबिगारी राजरोस चालली आहे.  आणि त्यांच्या मूर्ख हट्टामुळे ते ह्या अन्यायाला अगदी पात्रच ठरतात.

Read more: सामाजिक स्थिती

सांप्रदायिक अस्पृश्यता

(१९२५ मध्ये सातारा येथे म. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या प्रांतिक सामाजिक परिषदेच्या अध्यक्षीय भाषणातील भाग)

या विशिष्ट प्रकारच्या अन्यायाला जे बळी पडलेले आहेत, त्यांच्यामध्ये याबद्दलची जी जाणीव व जागृती उत्पन्न व्हावयास पाहिजे, ती उत्पन्न करण्याचे प्राथमिक काम बहुतेक यापूर्वीच होऊन चुकले आहे.  आता आम्हांस सोडवावयाचा बिकट प्रश्न विचारप्रांतातला नसून तो इच्छाप्रांतातला आहे.  आता यापुढे या प्रश्नाचा आणखी ऊहापोह व्हावयास पाहिजे अशातला प्रकार नाही.  पण आमच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर कसे व्हावे हाच काय तो प्रश्न आहे.  यासंबंधीचे आमचे विचार कितीही पूर्णत्वास पोहचले, तथापि त्यांच्या योगाने आमच्या हातून प्रत्यक्ष कृती घडण्यास जी इच्छाशक्ती अवश्य आहे, ती आमच्यांत प्रादुर्भूत होईल असे महणता येत नाही.  यासंबंधाने विचार करता अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की, लाला लजपतराय यांच्यासारख्या प्रसिध्द पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरलेल्या हिंदू सभेतही हा प्रश्न निर्णयाकरता अजूनही शास्त्री-पंडितांकउे सोपविण्यात यावा असे ठरले.  या प्रश्नाच्या निर्णयाला जर कोणी अगदी नालायक असेल, तर ते हे शास्त्री-पंडितच होत.  यांच्या अंगचा मोठा गुण म्हणला म्हणजे यांची विद्वत्ता; पण हा प्रश्न तर पडला अत्यंत निकडीच्या व्यवहारातला.  तेथे नुसती विद्वत्ता काय कामाची ?  शिवाय अशा प्रश्नांचा निर्णय करण्यास जी निःपक्षपाती बुध्दी असावयास पाहिजे, ती त्यांच्या अंगी असणे शक्य नाही.  त्यांच्या पोशिंद्यांच्या पसंतीवर त्यांची सारी भिस्त असणार, दुसरे, सांप्रतची कायदेकानूनची पुस्तके वेगळी व ज्यांच्यावर या शास्त्री-पंडितांची सारी मदार ते स्मृत्यादी ग्रंथ वेगळे.  हे स्मृत्यादी ग्रंथ म्हटले म्हणजे त्या प्राचीन काळी जे जे प्रघात अथवा रूढी प्रचारात असत, त्यांच्या नोंदींचे पुसतके अथवा पोथ्या.  त्यांच्या अर्वाचीन कालाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या उलगडयास उपयोग होण्याचा संभव बहुतेक थोडाच असणार !  शेवटची मुद्दयाची गोष्ट ही की, या दुर्दैवी अस्पृश्यवर्गाविषयी यांना बिलकुल सहानुभूती नसून उलट आपले अभिप्राय त्यांना प्रतिकूल निःपक्षपाती म्हणतात; पण तेही पाहावे तो न्यायाधीशाचा कल अनुकूल असल्याची शंका असल्यामुळे खटला वर्ग केल्याची उदाहरणे घडून आलेली आहेत.  मी विचारतो की, हा अस्पृश्यांचा प्रश्न जर शास्त्री-पंडितांकडे सोपवायचा तर पतितपरावर्तन, हिंदु-मुसलमानांतील एकी, हिंदूंची संघटना इत्यादी प्रश्नही त्यांच्याकडेच निर्णयाकरिता का सोपवू नयेत ?  आपला इतका छळ होत असूनही आपल्याला आदि हिंदू म्हणवून हिंदुधर्माविषयीचा आपला आपलेपणा जे जाहीर करीत आहेत, त्यांना निदान ख्रिस्ती वगैरे अन्य धर्मांचा आश्रय करणाऱ्यांच्या बरोबरीने वागविणे हे आपले कर्तव्य आहे, इतकेही हिंदू सभेला वाटू नये काय ?  धर्मांतर केलेले आदि हिंदू; आणि आपणांस अद्याप हिंदू म्हणविणारे आदि हिंदू यांच्या बाबतीत असा भेदाभेद का करावा ?  तात्पर्य, या सर्व प्रकारचे मूळ शोधू गेल्यास त्या बाबतीत आमच्या अंतःकरणात उत्कट इच्छेचा पूर्ण अभाव आहे, हेच कबूल करावे लागेल.

गुलामांच्या व्यापार, सतीची अमानुष चाल वगैरे बंद करण्याच्या कामी जसे कायद्याने साह्य मिळाले, तसेच याही बाबतीत मिळवू म्हटले, तर तोही मनू बहुतेक पालटल्यासारखा दिसतो.  इतकेच नाही, तर वायकोम येथे घडलेला प्रकार मनात आणता कायद्याकडून नको त्या पक्षालाच साह्य मिळू पाहत आहे.  अशा स्थितीत अन्यायाला नाहक बळी पउत असलेला हा अस्पृश्यवर्ग व त्यांचे प्रतिपक्षी यांच्यातील लढा 'बळी तो कान पिळी' या न्यायानुसार नुसत्या परस्परांच्या बाहुबलाच्या उणेअधिकपणावरच निकालात लावण्याचा प्रसंग आम्ही येऊ देणार काय ?

संपादकीय

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने थोर समाजसुधारक, विचारवंत व संशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे समग्र साहित्य संपादित करून प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.  त्या निर्णयानुसार महर्षी शिंदे यांचे समग्र वाङमय तीन खंडांमध्ये प्रकाशित करावयाचे मंडळाने योजिले आहे.  त्यांपैकी पहिल्या खंडात महर्षी शिंदे यांचे अस्पृश्यताविषयक सगळे संशोधन आणि चिंतन, त्याचप्रमाणे त्यांच्या आकलनाला उपयुक्त ठरेल अशा प्रकारची मुलभूत स्वरूपाची संशोधनसामग्री एकत्रिक करण्यात आलेली आहे.  महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या समग्र वाङमयाचा हा पहिला खंड भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन या शीर्षकाखाली प्रसिध्द करण्यात येत आहे.  त्यांच्या लेखनाचा दुसरा खंड हा वैचारिक लेखनाचा असून तिसऱ्या खंडामध्ये महर्षी शिंदे यांचे आत्मपर स्वरूपाचे समग्र ललित लेखन समाविष्ट करण्यात येणार आहे.

महर्षी शिंदे यांचे सगळे वाङमय उपलब्ध असणे ही महाराष्ट्राची आत्यंतिक निकडीची, सांस्कृतिकदृष्टया महत्त्वाची बाब आहे.  महाराष्ट्र आणि भारत यथातथ्य रीतीने सर्वांगीण स्वरूपात समजून घेण्याच्या दृष्टीने महर्षी शिंदे यांचे वाङमय मौलिक स्वरूपाचे आहे, याबाबतीत विचारवंतांचे दुमत होणार नाही.  याचे कारण महाराष्ट्राची आणि भारताची सामाजिक पुनर्घटना करण्याचे लोकोत्तर कार्य करणाऱ्या विभूतींपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे एक महान व्यक्तिमत्त्व होते.  ही सामाजिक पुनर्घटना न्यायाच्या, समतेच्या व विवेकाच्या पायावर आधारलेली असावी, असा त्यांचा प्रयत्न होता.  अन्य सुधारकांपेक्षा महर्षी शिंदे यांचा वेगळेपणा असा, की ते सामाजिक सुधारणा व्हाव्यात एवढेच सांगून थांबणारे नव्हते, तर ह्या सुधारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आत्यंतिक तळमळीने कार्य करणारे धडाडीचे कर्ते पुरुषही होते.  आपला विचार, उक्ती व कृती यांच्यामध्ये सुसंगती राखण्याचा सच्चेपणा व धडाडीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती.  म्हणून सुधारकांच्या प्रभावळीतसुध्दा ते आपल्या वेगळेपणाने उठून दिसतात.  म्हणूनच त्यांच्या कार्याचे यथायोग्य आकलन होण्याच्या दृष्टीने त्यांचे समग्र साहित्य अभ्यासणे आवश्यक आहे.

सामाजिक पातळीवरील अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला अखिल भारती पातळीवर विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळापासून हात घालणारे; अस्पृश्य, स्त्रिया व शेतकरी या वर्गांच्या सुधारणेसाठी झटणारे, तसेच मुरळी सोडण्यासारख्या दुष्ट सामाजिक रूढी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे आणि मौलिक स्वरूपाचे संशोधन व लेखन करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले व त्यांच्या हातून ऐतिहासिक महत्त्वाचे सामाजिक सुधारणाविषयक कार्य कोणत्या प्रकारे घडले, याचा थोडक्यात का होईना परिचय करून घेणे आवश्यक वाटते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी जमखंडी येथे प्रतिष्ठित मराठा कुटुंबात झाला.  हल्ली कर्नाटक राज्यात असलेले जमखंडी हे गाव त्या काळी छोटेखानी ब्राह्मणी संस्थान होते.  कानडी व मराठी अशा दोन्ही भाषा तिथे बोलल्या जात असत.  कर्नाटक व महाराष्ट्र अशा दोन्ही संस्कृतींचा मेळ या गावी होता.  लहानपणची श्रीमंती जाऊन त्यांच्या कुटुंबाला पुढे दारिद्रय आले.  दारिद्रयाचा अनुभव त्यांच्या मनाच्या घडणीत महत्त्वाचा ठरला असावा.  कारण आयुष्यात त्यांनी गरिबांचा, दीनदुबळयांचा व पीडितांचा कैवार घेतला.  त्यांचे वडील वारकरी संप्रदायाचे होते.  घरातील वारकरी संप्रदायाचे सात्त्वि वातावरण व आईवडिलांच्या शुध्द आचरणाचे संस्कार यातून आपली भावी सामाजिक सुधारणा उदय पावली, असे शिंदे यांना वाटते.  ''मी प्रार्थनासमाजात गेल्यामुळे सुधारक झालो नाही, तर आधीच सुधारक होतो, म्हणून प्रार्थनासमाजात गेलो'' असेही त्यांनी म्हणून ठेवले आहे.

शिंदे यांच्या घरातील वातावरण उदारमतवाडी व सुधारकी होते.  त्यांच्या घरात पडदा पाळण्याची जुनी रीत पाळली जात नसे, की जातिभेदही पाळला जात नसे.  आपल्या घरात जातिभेदाचा संस्कारच कुणाच्या मनावर झाला नसल्यामुळे आधुनिक सुधारकांप्रमाणे जातिभेद सोडण्याचा खटाटोप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.  अशा वातावरणात विठ्ठल रामजींच्या मनाची घडण झाली.

१८९१ मध्ये जमखंडी येथून मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक्युलेशनची परीक्षा चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण झाल्यानंतर ते विद्यापीठीय शिक्षणासाठी १८९३ च्या आरंभी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गेले.  महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच युनिटेरियन या उदारमतवादी धर्ममताचा त्यांना परिचय झाला व त्यासारखीच एकेश्वरवादी धार्मिक तत्त्वप्रणाली असणाऱ्या प्रार्थनासमाजाशी त्यांचा संबंध आला; व ते प्रार्थनासमाजात जाऊ लागले.  त्यांचे धर्मविषयक वाचन आस्थेने सुरू झाले.  न्या. रानडे, डॉ. भांडारकर, का. बा. मराठे या प्रार्थनासमाजीय ज्येष्ठांची व्याख्याने त्यांना ऐकावयास मिळू लागली.  या साऱ्याचा साकल्याने परिणाम होऊन १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची रीतसर दीक्षा घेतली.  महाराष्ट्रातील प्रार्थनासमाज म्हणजे बंगालमधील राजा राममोहन रॉय यांनी १८३३ मध्ये स्थापन केलेल्या ब्राह्मसमाजाचे भावंडच होय.  धर्म ही जीवनातील एक स्वतंत्र बाब नसून सर्व जीवन व्यापून टाकणारी आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे, अशी त्यांची धारणा झाली.  भ्रामक धर्मकल्पनेमुळे निर्माण झालेली जीवनातील अनिष्टे नष्ट करण्यासाठी व जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी उन्नत अशा एकेश्वरी धर्माचा आश्रय घेणे व त्याचा समाजाच्या सर्व थरांत प्रसार करणे त्यांना अत्यंत निकडीचे वाटू लागले.  ह्या जाणिवेतूनच त्यांनी आपले सर्व आयुष्य उन्नत अशा ब्राह्मधर्माचा प्रसार करण्यासाठी प्रचारक होण्याच्या हेतूने वाहावयाचे ठरविले.  त्या हेतूनेच इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथील धर्मशिक्षणासाठी जाण्याचे ठरविले व भारतातील प्रार्थनासमाज व ब्राह्मसमाज यांच्याकडून त्यांची निवडही झाली.

१९०१ ते १९०३ अशी दोन वर्षे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यात व्यतीत केली.  या काळात त्यांनी तुलनात्मक धर्मशास्त्र, ख्रिस्ती धर्म, बौध्द धर्म, पाली भाषा, तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.  मात्र धर्माचे पुस्तकी शिक्षण घेण्यावरच न थांबता त्यांनी इंग्लंडमधील विविध धर्मसंस्था वेगवेगळया प्रकारची मिशने चालवून परोपकाराची कामे कशी करतात, याचे नीट अवलोकन केले.  त्याच वेळी आपण हिंदुस्थानात परत गेल्यानंतर अशाच प्रकारचे कार्य करावे, अशी जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली.

१९०३ सालच्या  नोव्हेंबरमध्ये ऑक्सफर्ड येथील अभ्यासक्रम संपवून शिंदे भारतात परत आले व मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक (मिशनरी) म्हणून काम करावयास त्यांनी प्रारंभ केला.  प्रार्थनासमाजाचे कार्य करीत असताना त्यांना भारतभर प्रवास करावा लागत असे.  या काळात, हिंदुस्थानातील विविध प्रांतांतील अस्पृश्यवर्गाची स्थिती किती हलाखीची आहे, स्पृश्यवर्गाकडून त्यांच्यावर किती अनन्वित जुलूम होतो, अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीमुळे अवमानित स्वरूपाचे पशुवत जिणे त्यांना कसे जगावे लागते, हे त्यांनी बघितले; व अस्पृश्यवर्गाच्या दुःखाची वेदना त्यांच्या अंतःकरणाला झोंबली.  याचा परिणाम म्हणून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि या वर्गाची सुधारणा करण्यासाठी आपण आपले आयुष्य समर्पित करून कार्य करावे, असा दृढ निश्चय त्यांनी प्रबळ आंतरिक प्रेरणेने केला.  अस्पृश्यवर्गाची स्थिती व ती सुधारण्याचे उपाय यासंबंधी त्यांनी 'इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशन' पुढे व्याख्यान दिले व त्यानंतर या व्याख्यानाची एक लहानशी इंग्रजी पुस्तिकाही ऑगस्ट १९०६ मध्ये प्रसिध्द केली.  याच वेळी त्यांनी अस्पृश्यवर्गाच्या जीवनामध्ये संपूर्ण पालट घडवून आणण्याच्या हेतूने अखिल भारतीय पातळीवर मिशनप्रमाणे कार्य करणारी एक संस्था स्थापन करण्याचा मनोदयही प्रकट केला व प्रत्यक्षात मुंबई येथे १६ ऑक्टोबर १९०६ रोजी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली.

अस्पृश्यतानिवारण कार्याला युगप्रवर्तक प्रारंभ महात्मा जोतीबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला केला.  मात्र समकालीन सुशिक्षित वर्गाच्या साहाय्याच्या अभावी त्यांचा प्रयत्न लवकरच खंडित झाला व विसावे शतक उजाडले.  त्या वेळी अस्पृश्यतेसारखी माणुसकीला काळिमा आणणारी रूढी भारतीय समाजामध्ये अस्तित्वात आहे, याची फारशी जाणीवही कोणाला नव्हती.  अस्पृश्यवर्गीयांना शिक्षण देण्याचे काहीएक प्रयत्न मुंबई, बडोदा, मद्रास, मंगळूर येथे चालले होते.  मात्र त्यांचे स्वरूप स्थानिक होते.  सामाजिक पातळीवरील अस्पृश्यतेची जाणीवच कोणाला नव्हती, एवढी ही चाल लोकांच्या अंगवळणी पडली होती व ती स्वाभाविक म्हणून सगळयांनी पत्करली होती.  अशा या काळात भारतीय समाजाला कलंकभूत असणारी सामाजिक पातळीवरची अस्पृश्यतेची रूढी नष्ट करण्यासाठी व अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी स्थापन केलेली अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी मिशनसारखी संस्था म्हणूनच ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाची ठरते.

एकदा मिशन ही संस्था स्थापन केल्यानंतर शिंदे यांनी तिचे कार्य पश्चिम आणि दक्षिण भारतात झपाटयाने वाढविले.  त्यांनी आपल्या कार्याचे स्वरूप द्विविध मानले.  एक, शतकानुशतके अस्पृश्य मानले गेल्यामुळे निकृष्टावस्था प्राप्त झालेल्या ह्या समाजाला शिक्षण देऊन, उद्योगाची कौशल्ये शिकवून, त्यांचा स्वाभिमान जागृत करणे व त्यांना उत्तम नागरिक करणे; तर त्यांच्या कार्याचा दुसरा भाग म्हणजे सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नष्ट करण्याचा.  ही अस्पृश्यता असते कोठे ?  तर स्वतःला स्पृश्य म्हणविणाऱ्या लोकांच्या भ्रामक समजुतीमुळे व या समजुतीला रूढ धर्माचे व चालीचे पाठबळ मिळाल्यामुळे ती स्पृश्यवर्गीयांच्या मनात निर्माण झालेली असते.  स्पृश्यवर्गीयांच्या मनातील ही अस्पृश्यताविषयक जाणीव नष्ट करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता.  हे कार्य करण्यासाठी आपल्या जातिनिष्ठ समाजरचनेत ज्याच्या सांगण्यावर स्पृश्य समाजाचा विश्वास बसू शकेल, अशा स्पृश्यवर्गातूनच हे काम करण्यासाठी कर्तबगार मनुष्य अवतरणे आवश्यक होते.  ही कामगिरी पार पाडण्याचे इतिहासदत्त कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

मिशनच्या स्थापनेनंतर प्रारंभापासूनच शिंदे यांनी या कामाला वेग आणला.  मिशनसाठी त्यांना सात आजीव कार्यवाह मिळाले.  मुंबई येथे चार शाळा व उद्योगशाळा सुरू केल्या.  अस्पृश्यवर्गीय स्त्रियांसाठी निराश्रित सेवासदनाची स्थापना केली.  या वर्गातील लोकांसाठी दवाखाना उघडला.  विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालविली.  मुंबईबाहेर भावनगर, नागपूर, अकोला, इंदूर, मनमाड, पुणे, इगतपुरी, हुबळी, धारवाड, मद्रास, मंगळूर इत्यादी ठिकाणी, पश्चिम व दक्षिण हिंदुस्थानात मिशनच्या बारा शाखा उघडल्या.  १९०९ व १९१२ साली पुण्यास मिशनच्या व्यापक प्रमाणात प्रांतिक परिषदा भरविल्या व १९१८ साली मुंबई येथे भव्य प्रमाणात अस्पृश्यतानिवारक परिषद भरविली.

शिंदे यांनी केलेल्या कार्यामधून अस्पृश्यांसंबंधी करावयाच्या कामाबद्दल त्यांची समज जशी प्रकट होते त्याचप्रमाणे त्यांचे संघटनकौशल्यही दिसून येते.  अस्पृश्यवर्गीयांसंबंधी काम करताना त्यांनी आपली राजकीय मते बाजूला ठेवली व ना. गोखले, लो. टिळक, ऍनी बेझंट, लाला लजपतराय, म. गांधी इत्यादी जहाल-मवाळ राजकीय व्यक्तींचे साहाय्य घडले. बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड, इंदूरचे तुकोजीराव होळकर, म्हैसूरचे कांतिरव महाराज यांच्यासारखे संस्थानिक; सर जॉन क्लार्क, सर म्यूर मॅकेंझी, डॉ. मॅन यांसारखे इंग्रज अधिकारी; श्री शिवराम जानबा कांबळे, श्रीपतराव डांगळे, नाथ महाराज यांसारखे अस्पृश्यवर्गातील पुढारी या सर्वांचे सहकार्य मिळविले.  अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न राष्ट्रीय सभेने हाती घ्यावा, यासाठी त्यांनी सात-आठ वर्षे सातत्याने प्रयत्न केला.  अखेरीस १९१७ च्या कलकत्त्याच्या अधिवेशनात डॉ. ऍनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर होऊन अस्पृश्यतानिवारण हा राष्ट्रीय सभेच्या कार्याचा एक भाग झाला.  महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणाचे कार्य संस्थात्मक प्रयत्नांच्या द्वारा पहिल्यांदाच अखिल भारतीय पातळीवर नेले.  यात त्यांची तळमळ, दूरदृष्टी आणि कार्यकुशलता दिसून येते.  अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचा ध्यास त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत घेतला होता.

अस्पृश्यवर्गाची उन्नती करणे हा असा शिंदे यांच्या जीवनातील कर्तृत्वकाळापासूनचा ध्यास होता, त्याचप्रमाणे अस्पृश्यतेसंबंधी संशोधन करणे, हाही त्यांच्या आस्थेचा एक प्रमुख विषय होता.  अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारण्यासंबंधी वरच्या वर्गाच्या लोकांनी चालविलेले प्रयत्न त्याचप्रमाणे त्या वर्गातील मंडळींचे स्वतःच्या उध्दाराचे प्रयत्न ध्यानात घेऊन 'इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशन' ने व प्रार्थनासमाजाने एकत्र येऊन त्यांच्यासंबंधी काय करण्याची आवश्यकता आहे यासंबंधी प्रतिपादन करणारा 'इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस' हा लेख १९०५ च्या डिसेंबरमध्ये तीन हप्त्यांत 'सुबोधपत्रिके' च्या इंग्रजी बाजूमधून प्रसिध्द केला.  भारतामधील विविध प्रांतांतील अस्पृश्यवर्गाची स्थिती, त्यांचे स्वरूप, अस्पृश्यवर्गातील विविध जातींची नावे ह्यासंबंधीचा स्वतःच्या निरीक्षणाच्या आधारे त्यांचा अभ्यास चाललेला होता.  त्याला १९०१ मधील सरकारी खानेसुमारीचा आधार देऊन 'ए मिशन ऑप दि डिप्रेस्ड क्लासेस - प्ली' या शीर्षकाचा लेख त्यांनी 'इंडियन सोशन रिफॉर्मर' च्या अंकात तसेच स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने ऑगस्ट १९०६ मध्ये प्रसिध्द केला.  या लेखामध्ये अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण सुधारणेसाठी व अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्यासाठी एक देशी मिशन असण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादिली.  शिंदे यांचा हा लेख म्हणजे भारतातील अस्पृश्यवर्गासंबंधी लिहिलेला पहिला संशोधनपर लेख म्हणावा लागेल.  शिंदे हे आयुष्यभर प्रत्यक्ष अस्पृश्यािनिवारणाचे कार्य करीत होतेच.  शिवाय अस्पृश्यता कशी निर्माण झाली, इतिहासकाळापासून तिचे स्वरूप काय होते, याबद्दल यांचे संशोधन व चिंतन चालू होते.  त्याविषयी वेळोवेळी ते लेखही लिहीत होते.  'बहिष्कृत भारत' (१९०८), 'अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास' (१९२२), 'ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग' (१९२८) हे त्यांचे प्रमुख संशोधनपर लेख होत.  अस्पृश्यतेसंबंधी समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून लिहिलेला त्यांचा भारतीय अस्पश्यतेचा प्रश्न हा प्रबंध १९३३ साली प्रसिध्द झाला.

महर्षी शिंदे यांच्या समग्र वाङमयाच्या या पहिल्या खंडात त्यांच्या सर्व अस्पृश्यताविषयक लेखनाचा तर समावेश केला आहेच, शिवाय त्यांनी केलेल्या अस्पृश्यतानिवारण कार्यासंबंधी मूलभूत स्वरूपाची संशोधनसामग्री येथे एकत्रित केलेली आहे.  या खंडाच्या पहिल्या विभागात महर्षी शिंदे यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा मौलिक स्वरूपाचा भारतातील अस्पृश्यता या विषयावरचा पहिला म्हणता येईल असा प्रबंध समाविष्ट केलेला आहे.  ग्रंथाच्या दुसऱ्या भागामध्ये महर्षी शिंदे यांच्या अस्पृश्यताविषयक लेखांचा व व्याख्यानांचा समावेश केलेला आहे.  या भागाच्या प्रारंभीच महर्षी शिंदे यांचे १९०५ व १९०९ साली त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेले लेख दिलेले आहेत.  इंग्रजी व मराठी अशा लेखांचा येथे एकत्रित स्वरूपात समावेश करण्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यताविषयक लेखनाला, त्यांच्या एतद्विषयक संशोधनाला किती आधीपासून प्रारंभ केला होता, हे वाचकांच्या यथायोग्यपणे ध्यानात यावे.  या भागातील अस्पृश्यताविषयक लेखनातून महर्षी शिंदे यांच्या अंतःकरणात अस्पृश्यवर्गाबद्दल किती अपरंपार प्रेम होते, कळकळ होती व या वर्गाच्या प्रश्नांबाबत त्यांची वैचारिकता कशी मूलभूत स्वरूपाची होती, याचा प्रत्यय येऊ शकेल.

प्रस्तुत ग्रंथाच्या तिसऱ्या विभागामध्ये काही महत्त्वपूर्ण परिशिष्टे देण्यात आलेली आहेत.  ह्या परिशिष्टांवरून, 'सुबोधपत्रिके'तील स्फुट लेखांवरून अस्पृश्यताविषयक प्रश्नांची समकालीनांची समज व मानसिकता कोणत्या प्रकारची होती, हे आपल्या ध्यानात येऊ शकते.  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे अस्पृश्यवर्गाचे निवडणुकीतील प्रतिनिधित्व कोणत्या प्रकारचे असावे याबद्दल त्यांच्या भूमिकांबद्दलचे समज-गैरसमज होत.  महर्षी शिंदे यांच्याबद्दलची या संदर्भातील भूमिका त्यांच्या साऊथबरो कमिशनपुढील साक्षींचे नाव घेऊन अनेकजणांनी सांगितल्याचे दिसून येते.  प्रस्तुत ग्रंथात साऊथबरो कमिशनपुढील महर्षी शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचया साक्षी जशाच्या तश उध्दृत केल्या आहेत.  त्यावरून महर्षी शिंदे यांच्यावर त्या काळामध्ये केली गेलेली टीका कशी अनाठायी होती व नंतर टिकवून धरून वाढीस लावलेला महर्षी शिंदे यांच्याबद्दलचा गैरसमज कसा विपर्यस्त होता, हे वाचकांच्या व अभ्यासकांच्या ध्यानात येऊ शकेल.  अस्पृश्यवर्गाबद्दल आंतरिक कळकळ असणाऱ्या या दोन्ही विभूतींच्या भूमिकेत मूलभूत विरोध तर नाहीच, उलट सारखेपणा आहे, असेच ध्यानात येईल.  या दोघांच्या साक्षींच्या जोडीनेच तुलना करण्यासाठी बहुजन समाजाचे एक पुढारी श्री. भास्करराव जाधव व अस्पृश्यवर्गाचे पुढारी श्री. गणेश आकाजी गवई या दोघांच्या साक्षी तेथेच समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

ब्राह्मसमाजाने केलेले अस्पृश्यतानिवारणाचे कार्य ज्या एका इंग्रजी पुस्तिकेत नमूद केलेले आहे, ती पुस्तिकाही येथे समाविष्ट केलेली आहे.  या पुस्तिकेत नमूद केल्यावरून महर्षी शिंदे यांच्या कार्याचा वेगळेपणा व भरीवपणा ध्यानात येऊ शकतो.  महर्षी शिंदे यांचे मिशनच्या प्रारंभिक कामातील एक सहकारी व त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गाच्या कार्यातील म. गांधींचे निष्ठावंत सहकारी श्री. ठक्करबाप्पा यांचा महर्षी शिंदे यांच्यावरचा इंग्रजीतील मृत्युलेख समाविष्ट करण्यात आलेला आहे.  विठ्ठल रामजी शिंदे यांना आपण चार गुरूंपैकी एक व आपल्या जन्मदात्यानंतर त्यांनाच आपण मानतो; त्यांच्या पायाशीच आपण सार्वजनिक कार्याचे धडे घेतले आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे.  त्यांनी असेही म्हटले आहे, की 'ही गोष्ट सर्वज्ञात आहे की मुंबई प्रांताकडील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे ते जनक होत.  पंजाब व उत्तरप्रदेश सोडला तर सर्व भारतातील या प्रकारच्या कार्याला प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होते.'  ठक्करबाप्पा यांच्यासारख्या अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला वाहिलेल्या निष्ठावंत समकालीन पुरुषाने महर्षी शिंदे यांच्या योग्यतेचे यथायोग्य आकलन व मूल्यमापन केले, असे म्हणावे लागेल.

प्रस्तुत खंडाच्या चौथ्या भागात दोन अहवाल समाविष्ट केले आहेत.  त्यावरून १९०६ ते १९१२ या पहिल्या सहा वर्षाच्या मिशनच्या कार्याचा वृत्तान्त साधार व विश्वसनीयपणे समजू शकतो.  १९१२ साली महर्षी शिंदे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मिशनची म्हणजे 'भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी'ची महाराष्ट्र परिषद भरविलेली होती.  तिचा साद्यंत अहवाल परिषदेनंतर प्रकाशित करण्यात आला.

प्रस्तुत अहवाल म्हणजे अस्पृश्यतानिवारण कार्याचा व महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचाही महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणावा लागेल.  मिशनच्या स्थापनेला सहा वर्षे झाल्यानंतर मिशनच्या महाराष्ट्रातील हितचिंतकांची ही व्यापक परिषद विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या सहाकाऱ्यांच्या सहकार्याने ऑक्टोबर १९१२ मध्ये सर रामकृष्णपंत भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ऍम्फी थिएटरमध्ये भरविली.  अस्पृश्यतानिवारण कार्याबद्दल व अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करण्याच्या हेतूने भरविलेल्या या परिषदेची अनेकविध मौलिक वैशिष्टये होती.  संपूर्ण महाराष्ट्रातून अस्पृश्यवर्गातील सर्व जातींचे प्रतिनिधी तसेच या कार्याबद्दल आस्था असणारी समाजातील कर्ती मंडळी परिषदेला निमंत्रित करण्यात आली होती.  या परिषदेचे आयोजन करण्यासाठी स्वागतसमितीने किती अपार कष्ट घेतले व विठ्ठल रामजी शिंदे यांनी किती दूरदृष्टी दाखविली, हे संपूर्ण अहवालावरून दिसून येते.  अस्पृश्यवर्गासंबंधी करावयाच्या विविध कार्यासंबंधी समाजातील पुढाऱ्यांनी विद्वत्तापूर्ण व सुधारणेची दिशा दाखविणारी भाषणे केली.  अस्पृश्यवर्गातील महार, मांग, भंगी इत्यादी विविध जातींतील पुढाऱ्यांनी आपापल्या जातीचे विशिष्टत्वाने प्रश्न मांडले.  सातारा येथील मांग जातीच्या लोकांना जन्मजात गुन्हेगार समजून दैनंदिन हजेरीची कशी सक्ती आहे, हे श्रीपतराव चांदणे यांनी आपल्या निबंधातून मांडले, तर पुण्याच्या नाथा महाराज मेहतर यांनी पुण्याच्या ड्रेनेजचे काम सुरू झाल्याने आपल्या पोटावर पाय येईल, असे सांगून परिस्थितीचा दारुण दैवदुर्विलास लोकांपुढे मांडला.  अशा प्रकारे तीन दिवस अस्पृश्यताविषयक प्रश्नांचा मूलभूत स्वरूपाचा तसेच व्यावहारिक पातळीवरून विचार झाला.

परिषदेसाठी सर्व जातींची मिळून दोनशेसाठी पाहुणेमंडळी बाहेरगावावरून आलेली होती.  अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गातील चारशे व स्पृश्यवर्गातील पन्नास मंडळींचे मिळून सहभोजनही झाले.  स्त्रियांच्याही स्वतंत्र सभा झाल्या.  श्री. महाभागवत (भावी शंकराचार्य), प्रोफेसर लक्ष्मणशास्त्री लेले यांच्यासारख्या जुन्या परंपरेतील मंडळींनीही परिषदेत भाग घेतला.  अशा तऱ्हेने ही अत्यंत आदर्श स्वरूपाची नमुदेदान परिषद झाली.  महर्षी शिंदे यांना तर या परिषदेमुळे पुणे या सनातन शहराचे अंतःकपाट उघडल्यासारखे वाटले.  अशा या परिषदेचा साद्यंत वृत्तान्त हा केवळ अस्पृश्यतानिवारण कार्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण इतिहास होय.

एकंदरीत महर्षी शिंदे यांच्या अस्पृश्यताविषयक सगळया लेखनाच्या बरोबरच अस्पृश्यताविषयक प्रश्नांची सर्वांगीण माहिती व्हावी, अभ्यासकांना व संशोधकांना या प्रश्नाच्या आकलनासाठी व पुढील संशोधनासाठी मूलभूत स्वरूपाची सामग्री उपलब्ध करून द्यावी, हाही उदृदेश या खंडातील सगळे लेखन एकत्रित करण्यामागे आहे.

'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'चे विद्यामान अध्यक्ष श्री. मधु मंगेश कर्णिक यांनी तसेच पूर्वाध्यक्ष प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी महर्षी शिंदे यांच्या समग्र वाङमयाचे संपादन करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली, याबद्दल साहित्य संस्कृती मंडळाच्या या दोन्ही अध्यक्षांचा तसेच मंडळाचा मी अत्यंत ॠणी आहे.

गो. मा. पवार
संपादक

संख्या आणि लक्षणे

प्रकरण सातवे

अखिल हिंदुस्थानात म्हणजे ब्रिटिशांच्या व एतद्देशीय संस्थानांच्या अमलाखाली असलेल्या प्रांतांत आणि शिवाय ब्रिटिश साम्राज्याखाली आलेल्या सरहद्दीवरील देशांत अस्पृश्य गणलेल्या मोठया जनसमूहांत किती भिन्न भिन्न जातींचा समावेश होतो आणि त्या प्रत्येकाची संख्या किती आहे, तसेच ह्या अनेक जातींचे किती मुख्य लक्षणांनी पुनः वर्गीकरण होऊ शकते ह्या गोष्टी ह्या प्रकरणात पाहावयाच्या आहेत.

ह्या अफाट देशावर ब्रिटिशांचे अधिराज्य झाल्यावर येथील एकंदर जनतेची पहिली शिरगणती इ.स. १८६७ ते ७२ च्या दरम्यान झाली.  पण त्या वेळी कित्येक मोठया संस्थानांतील जनतेची गणती झाली नाही.  पुढे दोन दशकांनी म्हणजे इ.स. १८८१ आणि १८९१ साली अधिक पूर्णत्वाने खानेसुमाऱ्या झाल्या.  पण आधुनिक समाजशास्त्राच्या दृष्टीने सर्वांगपूर्ण अशी खानेसुमारी इ.स. १९०१ सालच्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेच्या रात्री झाली.  ह्या गणनासत्राचे मुख्य अध्वर्यू एच.एच. रिस्ले आणि त्यांचे साथीदार इ.ए.गेट हे होते.  ह्यांच्या बहुमोल रिपोर्टाची अखिल हिंदी साम्राज्याची आणि प्रांतवार अजस्त्र पुस्तके इ.स. १९०३ साली प्रसिध्द झाली.  ह्याच वर्षी मी माझा विलायतेतील ऑक्सफर्ड विद्यालयातील तौलनिक धर्म आणि समाजशास्त्राचा अभ्यास आटोपून स्वदेशी परत आलो.  ब्राह्मसमाजाचा प्रचारक म्हणून पुढील कित्येक वर्षे हिंदुस्थानातील निरनिराळया प्रांतांत फिरण्याचा मला सुयोग घडला.  तेव्हा अखिल भारतातील मानीव अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याकरिता सुसंघटित प्रयत्न करणारी एक भारतीय मंडळी स्थापण्याचा मी संकल्प केला.  त्याची तयारी म्हणून प्रथम मला ह्या खंडवजा देशात ह्या मानीव अस्पृश्यांची संख्या किती आहे, हे नक्की ठरविणे अवश्य वाटले.  ह्या रिपोर्टात शोधून पाहता अस्पृश्यांचे जातवार आणि प्रांतवार जे आकडे मिळाले, ते एकत्र करिता म्हणून ५,३२,३६,६३२ हा अवाढव्य आकडा तयार झालेला पाहून मी स्वतःच आश्चर्याने थक्क झालो.  पुनःपुनः तपासून पाहिले तरी हा आकडा बळकटच झाला.  शेवटी तो मी इंग्रजी दैनिकांतून आणि मराठल मासिकांतून, शिवाय स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिध्द केला.  तोवर अस्पृश्यांची संख्या खरोखर एवढी मोठी असेल अशी कोणाची कल्पनाच नव्हती.  आश्चर्य सर्वांनाच वाटले.  पुष्कळांनी कुरकूर केली.  पण सांगोपांग विचार करून हा आकडा कमी आहे असे कोणीच सिध्द करावयाला पुढे आले नाही.  सन १९०१ ह्या वर्षी अखिल भारताची जनसंख्या २९,४३,६१,०५६ होती.  तिच्यापैकी ५ कोटीहूनही जास्त वरील संख्या अस्पृश्यांची ठरली.  त्यामुळे एकषष्ठांश भारत अस्पृश्य हे एक पुढे ब्रीदवाक्यच बनून राहिले !  त्याला अद्यापि बाधा आलेली नाही.

त्यानंतर आजवर तीन दशवार्षिक खानेसुमाऱ्या झाल्या, तरी प्रस्तुत लेखाकरिता मला इ.स. १९०१ सालच्या खानेसुमारीचा हवाला घ्यावा लागत आहे.  ह्याची कारणे अशी :  हिंदी - विशेषतः हिंदू - समाजाचे लौकिकदृष्टया जे दर्जे ठरविण्यात आले आणि त्या दृष्टीने भिन्न वर्गाचे एकूण आकडे प्रसिध्द झाले; ते ह्याच १९०१ साली.  ह्या पध्दतीचा स्वीकार मागील दशकात झाला नव्हताच, पण पुढील दशकातही झाला नाही, हे आश्चर्य !  दुसऱ्या कित्येक दृष्टीने दर्जे ठरविण्याची ही पध्दत अप्रिय, अनिष्ट व काही प्रांती तर अशक्य ठरली होती, तरी, ही योजना (Social Grouping) रिस्ले साहेबांनी इतकी मेहनत घेऊन व विरोध सोसून तयार केली नसती व तिला अनुसरून प्रांतवार आकडे मागवून प्रसिध्द केले नसते तर अस्पृश्यांचा वरील आकडा ठरविण्यास दुसरा मार्गच उरला नसता.  ह्यांचेच साथीदार इ.ए. गेट हे पुढील म्हणजे १९११ सालच्या खानेसुमारीचे प्रमुख होते, तरी त्यांनी ह्या योजनेप्रमाणे आकडे निराळे प्रसिध्द केले नाहीत.  कर्झनशाहीची कारवाई, बंगालची फाळणी, राजकारणी अस्वस्थता, हिंदु-मुसलमानांचे परस्पर संख्याबळ ठरविण्याचे महत्त्व, वगैरे आगंतुक कारणांनी अस्पृश्यांचे संख्यामापन ही अधिक नाजूक बाब होऊ लागली.  तथापि ह्या संख्येत म्हणण्यासारखा मोठा फरक पडला असावा, असे वाटत नाही.  संख्याशास्त्राच्या अनुसारे तीस वर्षांत या संख्येत भरच पडलेली असणार.  उतार होण्याचे कारण नाही.  अस्पृश्यतानिवारकांना प्रयत्नांनी अस्पृश्यतेचा जोर कमी झाला आहे.  पण त्यामुळे अस्पृश्य ठरलेल्यांची संख्या कमी होण्याचे कारण काय ?

वरील कारणांमुळे आणि गेल्या दोन दशकांचे रिपोर्ट मिळविणेही फार त्रासाचे व खर्चाचे झाल्यामुळे मी १९०१ सालचेच आकडे पुनः ह्या लेखासाठी तपासून पुढील याद्या तयार केल्या आहेत.  सत्तावीस वर्षांपूर्वी प्रांतवार अस्पृश्यांच्या काही प्रमुख जातींची संख्या प्रसिध्द केली होती.  आता लहानसान मिळतील तितक्या सर्व जातींची संख्या शोधून ती पुढे दिली आहे.  पूर्वी प्रसिध्द केलेली प्रांतवार संख्येची एकुणात ५,३२,३६,६३२ झाली; तर आता दिलेली सुमारे ३०० भिन्न जातीची एकुणात ५,०७,२९,२२४ झाली आहे.  ही सुमारे २५ लाखांची तूट आलेली आहे; ह्याचे कारण त्या वेळी अस्पृश्य मानलेल्या सर्व जातींचा ह्या नवीन यादीत समावेश केलेला नाही.  उदाहरणार्थ, छोटा नागपूर प्रांतातील ओरावन, सांताळ वगैरेंचा समावेश नवीन यादीत केलेला नाही.  कारण त्या जाती केवळ जंगली आहेत; त्यांपैकी सर्वच अस्पृश्य नाहीत.  मुंबई इलाख्यातील सुमारे २ लाख बेरडांचाही समावेश केला नाही.  कारण ह्या लोकांनी शंकराचार्यांकडे दाद लावून घेऊन स्वतःची स्पृश्यता शाबीत करून घेतली आहे.  नवीन यादीत सर्वच अस्पृश्य जातींचा समावेश झाला आहे, असेही म्हणवत नाही.  खरा आकडा ठरविणे फार कठीण, जवळ जवळ अशक्य काम आहे.  पण तो आकडा पूर्वीच्याच एकुणातीजवळ अधिक आहे असे धरून चालण्यास हरकत नाही.  काही झाले तरी एकषष्ठांश भारत अस्पृश्य ह्या विधानाला काही अद्यापि हरताळ लागत नाही.

पुढील नवीन यादीत ३०० च्या वर निरनिराळया अस्पृश्य मानलेल्या जातींची नावे व त्यांची संख्या दिली आहे.  त्यांच्या अस्पृश्यतेची पाच कारणे पुढीलप्रमाणे निरनिराळी असून शकतात.  ह्या पाच लक्षणांनुसार काही प्रमुख जातींचे येथे प्रथम वर्गीकरण करून दाखविले आहे.

१.  धंद्याच्या हीनपणामुळे

१.  मोची, चांभार, ढोर, खालपा, भांबी, डबगर (कातडयाची कामे करणारे).  
२.  धोबी, रंग्रज (रंगारी).
३.  पाशी, पारधी, बेडर, भिल्ल, बिल्लव, बागरी, किरात, वेट्टुवन.
४.  भंगी, हलालखोर, म्हेतर, डोम.
५.  सुणगार, चुन्नर, सुन्नरी (चुना करणारे).
६.  पान, होलया, भूमीज, भोई, धाशिया, ढाणक (शेतांतले गुलाम).
७.  सिंयाल (ताडीवाले), कल्लार, शानार (दारू गाळणारे).
८.  कोळी, जालीया, कैवर्त (मासे धरणारे).
९.  तुबयाझा, डोम, चंडाळ, महार (मसणवटीत काम करणारे).
१०. बांसफोर, बासोर, बुरूड (वेळूची कामे करणारे).
११. वणकर, ताती, जिनगर (शिवणे अगर विणणे करणारे).
१२.  धनगर, तांबट, तेली, कुंभार (विशिष्ट प्रांतांतच हे अस्पृश्य आहेत).
१३.  मुसाहर (उंदीर धरणारे).
१४.  चक्कलियन, शिकलगार, शक्ली (चाकावर धार लावणारे आणि कातडी कामे करणारे).
१५.  मघ, मेघ, गुरुडा, पंबाडा, दास, नाथ, जोगी, वर्णब्राह्मण, कपाली, दावली (निषिध्दधर्मी व हीन जातींची पौराहित्य करणारे).
१६.  खाटीक, कसाई.
१७.  सनाई, बाजगी, वाजंत्री, परैय्या (ढोल बडविणारे).


२.  प्राचीनकाळी स्वतंत्र, पण पुढे जिंकले गेल्यामुळे

१.  मेघ, म्हेर, म्हेतर, म्हार, मोघिया, मोगेर.
२.  मांग, मादिग, मातंग.
३.  बळहाई, ढाणके, डोम.
४.  नमशूद्र, पोड (पौंड्र), राजबंसी, कोच, मेच्च, गारो.
५.  नाग, नायकडे, नायाडी.
६.  माल, मालो, माळी.
७.  शबर, बाथुरी, बावुरी.
८.  पुलया, चिरुमा, परैया, पळळ, व्हलया.
९.  कोल, गोल्ल, कोरी, कोरवी.
१०.  येझवा, येळवा, तिय्या.
११.  तुबयाझा (अशुभ राजा), फयाचून.
१२.  चंड, मुंड, कंड, खोंड, गंड, गोंड.
१३.  ओरावन, सांताळ, हो.


३.  बौध्द व इतर पाषंड मानलेल्या धर्मांतून हिंदुधर्माच्या अमलाखाली बिनशर्त न आल्यामुळे -

परैय्या, नमशूद्र,पोड, (पौंड्र), बावुरी, सवर, येझवा, येळवा, तिय्या वगैरे.


४.  जंगली अवस्थेत राहिल्यामुळे -

भिल्ल, गोंड, खोंड, फासेपारधी, आडवीचिंची, वगैरे (ह्या जाती क्वचित अस्पृश्य भासतात.  पण त्यांना सर्रास अस्पृश्य कोटीत घालता येणार नाही.)


५.  मनुस्मतीत वर्णिलेल्या प्रतिलोमामुळे - (व्यभिचारी अथवा गुन्हेगार)

भामटे, ठग, देवदासी, वाघे, मुरळया, मातंगी वगैरे.


(पण ह्यांपैकी कोणीच अस्पृश्य झालेले दिसत नाहीत.  शेवटची मातंगी अस्पृश्य आहे, पण ती मांग जातीची म्हणून; व्यभिचार करते म्हणून नव्हे.  ह्या गोष्टीवरून, मनुस्मृतीत, जी प्रतिलोम शरीरसंबंधावरून म्हणजे ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष ह्यांच्यापासून निर्माण झालेली संतती, तिला चांडाल हे नाव देऊन तिला अस्पृश्य व बहिष्कृत ठरविले आहे, ते मत कसे निराधार आहे हे उघड होते.)

वरील वर्गीकरणात काही जातींची नावे पुनःपुनः आलेली आढळतील.  विशेषतः पाचही लक्षणांच्या जातींतील सर्वच नसल्या तरी बऱ्याच व्यक्ती आता अगदी हीन धंदे करीत असलेल्या आढळणे साहजिक आहे.  ज्या जाती पूर्वी स्वतंत्र आणि सुसंपन्न होत्या त्या कालवशात जित झाल्याने अस्पृश्य व बहिष्कृत केल्या गेल्यावर त्यांना हीन धंदे करणे प्राप्त झाले.  आधुनिक काळात त्यांना थोडा वाव मिळाल्यामुळे त्या जातींपैकी पुष्कळशा व्यक्ती वरिष्ठ धंदे करू लागल्या आहेत.  बंगाल्यात नमःशूद्र, मद्रासेकडे (मलबारात) येझवा, बिलवा वगैरेंमध्ये पुष्कळ विश्वविद्यालयाचे मोठमोठे पदवीधर, वकील, डॉक्टर, कौन्सिलर्स, पेढीवाले व पुढारी म्हणून आता चमकू लागले आहेत.  तांबट, तेली, धोबी, माळी, आणि कुंभार, धनगर अशा स्वच्छ जातीही, काही कानाकोपऱ्यांतील प्रांतांतून अस्पृश्य असलेल्या खानेसुमारीत पाहून आश्चर्य वाटते.  गुजराथेतील ढाणके व माळव्यातील बळहाई (बलाई) ह्या जाती केवळ कृषिकर्म व मोलमजुरी करणाऱ्या असून व्यवहारात मुळीच अस्पृश्य नाहीत.  आता अशा जातींची अस्पृश्यता व्यवहारात बहुतेक नष्ट झालेली आहे.  पण एकेकाळी अशांनाही हा डाग लागला होता,  ह्यावरून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची व्यापकता किती मोठी आहे हे दिसते.  म्हणून ह्यांचा उल्लेख करावा लागला आहे.  ह्या जाती स्वच्छ धंदे करणाऱ्या असून आणि पूर्वीपासून ह्या अस्पृश्य होत्याच असापुरावा नसून त्या आता अस्पृश्य मानल्या जाण्याचे कारण ह्या मध्यन्तरीच्या काळात बौध्द झाल्या असल्या पाहिजेत व ह्या लवकरच ब्राह्मणी हिंदू धर्माच्या हुकमतीखाली न आल्यामुळे अस्पृश्य मानल्या गेल्या.  ह्या बाबींचा विचार पहिल्या खंडात झालाच आहे.

संख्येची आणि व्याख्येची ओढाताण

इ.स. १९०७-८ चे सुमारास मी, इ.स. १९०१ च्या खानेसुमारीतून प्रथम हिंदुस्थानातील एकंदर अस्पृश्य मानलेल्या लोकांची वट्ट संख्या पाच कोटी बत्तीस लक्ष छत्तीस हजार सहाशे बत्तीस (५,३२,३६,६३२) ही प्रसिध्द केल्यापासून ह्या प्रचंड संख्येचीच नव्हे तर माझ्या व्याख्येची सारखी ओढाताण चाललेली पाहून केव्हा केव्हा बरीच करमणूक होते !  ह्याच सुमारास बंगाल्यात फाळणीची मोठी चळवळ उडाली.  त्या वेळी हिंदु-मुसलमानांची मोठी तेढ पडली.  अस्पृश्यांना ज्या अर्थी हिंदू इतके वाईट वागवीत आहेत, त्या अर्थी त्यांच्यातील जवळ जवळ एकचतुर्थांश मानीव अस्पृश्य भागाची गणना हिंदू समजून त्यांच्यात न व्हावी अशा मुसलमानांच्या सूचना येऊ लागल्या.  उलट हिंदूंना अस्पृश्य भाग निदान राजकारणापुरता तरी आपल्यातून बाहेर फुटून जाईल की काय ही भीती पडून त्यांनी हा भाग अस्पृश्य असला तरी हिंदूच आहे असा आग्रह धरिला.  पुढे लवकरच १९११ ची खानेसुमारी होणार होती.  सरकारांनी आपले १९०१ सालचे धोरण बदलून, हिंदू समाजाच्या निरनिराळया दर्जांच्या निरनिराळया वट्ट संख्या प्रसिध्द करण्याचे सन १९११ च्या खानेसुमारीत टाळले.  अस्पृश्यवर्ग हे सर्व हिंदू नसून त्यांच्यातील बराच भाग पिशाचपूजक (Animist) असावा असे भासविण्याचा ते विचार करू लागले.  तथापि कोणी म्हणण्यासारखा उद्योग करून वरील वट्ट आकडा आणि व्याख्या परिणामकारक रीतीने बदललेली माझ्या तरी ऐकिवात नाही.  मात्र ही संख्या वरच्याहून लहान ठरेल तर बरे, अशी हिंदू, मुसलमान व सरकार ह्या सर्वांचीच अंतर्गत इच्छा - मग ती कितीही भिन्न हेतूने असो - आहे हे खरे; पण केवळ इच्छेने आकडा कसा बदलावा !

पुढील कोष्टके पाहिल्यास आर्य, द्राविड, सिथियन, मोगल इत्यादी वंशदृष्टीने गणना करून दिलेली अस्पृश्यांची वट्ट संख्या सन १९०१ साली ५,३१,९६,६३२ झाली आणि हल्लीच्या सुमारे ३०० निरनिराळया अस्पृश्य मानलेल्या जातींची प्रांतवार संख्या ५,१७,३८,६७३ च भरली असे दिसून येईल.  (पृ. ८५-८६ पाहा.)  ह्यांत जवळ जवळ १५ लाखांची तफावत येते.  तिची कारणे मी वर दिलेलीच आहे.  ह्यांपैकी मुंबई इलाख्यातच १० लाखांची तूट, तर पंजाब, काश्मीर, राजपुताना ह्या भागांत जवळ जवळ १२ लाखांची वाढ दिसून येते.  ही तफावत काही जातींची गणना एके ठिकाणी अस्पृश्यात झाल्यामुळे व दुसरीकडे त्या जातींची न होता निराळयाच जातींची झाल्यामुळे पडलेली असली पाहिजे.  माझे हे म्हणजे, प्रत्यक्ष खानेसुमारीतील सर्व प्रांतांचे आकडे पुढे ठेवून आकडे मोडण्याची दगदग केल्याशिवाय कोणाच्या लक्षात यावयाची नाही.  ह्या तीस वर्षांत अस्पृश्यतानिवारणाच्या प्रयत्नाने ही संख्या फार थोडी कमी झाली असावी.  उलट अखिल हिंदुस्थानची लोकसंख्या पाच-साडेपाच कोटींनी वाढलेली आहे.  त्या वाढीचा हिस्सा अस्पृश्यांना मिळून त्यांची संख्या ६ कोटींजवळ जाणे संभवनीय आहे.  निदान ५॥ कोटींच्या खाली जाण्याचे काही कारण नाही.

मुंबई इलाख्यात दोन वर्षांपूर्वी स्टाट्र कमिटीने चौकशी केली.  तिने ज्या जातींचा समावेश केला आहे, त्यांची वट्ट संख्या सुमारे १४ लाखच दिली आहे.  पण त्यांचे तपशीलवार आकडे न देता त्यांनी हा वट्ट आकडाच कोठून मिळविला हे कळत नाही.  माझा आकडा २१ लाख आहे, तो ३० वर्षांपूर्वीचा आहे.

ह्या संख्येचा असा गोंधळ आणि ओढाताण होण्याचे दुसरे एक मुख्य कारण असे की, अस्पृश्यांची व्याख्या ठाम करणे आणि ती ठरली तरी तशा व्याख्येबरहुकूम खानेसुमारीतील भाडोत्री गणकांकडून नेमकी गणना होणे ही सोपी गोष्ट नाही.  हिंदुस्थानात मी पहिल्या खंडात ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे 'अस्पृश्य' ठरणारे वर्गच नुसते आहेत असे नव्हे, तर जंगली जाती, आणि जंगली असोत-नसोत, गुन्हेगार समजले जाणारे इतर वर्ग आहेत.  ह्या दुसऱ्या दोन भिन्न वर्गांची संख्या होता होईल तोवर माझ्या वरील कोष्टकांतून मी येऊ दिलेली नाही.  ह्या तिन्ही, म्हणजे १ अस्पृश्य, २ जंगली आणि ३ गुन्हेगार वर्गांची एकमेकांत गणनेच्या वेळी भेसळ होणे - कितीही खबरदारी घेतली तरी - अगदी सहज आहे.  राजकारणाच्या, राज्यकारभाराच्या, धर्माभिमानाच्या, सामाजिक इज्जतीच्या अगर इतर कोणत्याही अशाच आगंतुक सबबीमुळे वरील खबरदारीत ढिलाई झाली की, अस्पृश्यतेची मुळी व्याख्याच बदलते; आणि ती तशी बदललेली वरील कोणाही बेखबरदार व पक्षाभिमानी माणसांच्या अगर त्यांच्या अडाणी हस्तकांच्या मुळी लक्षातच येत नाही.  त्यामुळे संख्येविषयी हा वाद वेळोवेळी माजतो.  ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे लक्ष्यात घेऊनच मी वरील कोष्टके जबाबदारीपूर्वक पुनःपुनः तपासून प्रसिध्द करीत आहे.  दहा-पाच लाख संख्या कमी झाली काय किंवा वाढली काय, ही मोठी गोष्ट नाही.  साधारण मानाने हिंदुस्थानाच्या वट्ट लोकसंख्येचा एकषष्ठांश आणि हिंदूंच्या वट्ट लोकसंख्येचा एकचतुर्थांश भाग अस्पृश्य मानला जात आहे, हे खानेसुमारीचे विधान दुर्दैवाने अद्यापि अढळच आहे.

अस्पृश्यांच्या संख्येची व व्याख्येची अशी ओढाताण चालली असता अलीकडे दोन तीन वर्षे हिंदुस्थानची राज्यपध्दती सुधारण्याचा विचार ब्रिटिश पार्लमेंट करू लागली आहे.  त्यामुळे तर सर्व जाती आणि पक्ष ह्यांमधून धुमाकूळ चालला आहे.  अशा परिस्थितीत वरील ओढाताण अधिकच वाढली आहे.  लॉर्ड लोदियनच्या प्रमुखत्वाखाली जी फ्रँचाइझ कमिटी नेमली होती, तिचा रिपोर्ट प्रसिध्द झाला आहे.  त्यात ह्या व्याख्येचा व संख्येचा सर्व बाजूंनी विचार करूनही त्यांना निर्णायक मत देता आले नाही अशी कमिटीने कबुली दिली आहे.  तरी शेवटी जी कामचलावू व्याख्या त्यांनी ठरविली, ती मी वर केलेली आहे तशीच ठरविली.  म्हणजे, धंदा, दर्जा, सांपत्तिक अथवा शैक्षणिक स्थिती कशीही असो, ज्यांना रूढीमुळे वरिष्ठ म्हणविणारे हिंदू अस्पृश्य आणि बहिष्कृत मानतात, ते सर्व अस्पृश्य होत.  ह्या लोदियन रिपोर्टाचे पुस्तक पहिले पान ११९ वर, अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्यांची संख्या निरनिराळया कमिटयांनी अगर खात्यांनी कशी निरनिराळी ठरविली आहे, ते एका कोष्टकात दिले आहे.  हे कोष्टक खाली उध्दृत केले आहे.  यातील आकडे १० लाखांचे आहेत.  ह्यात संस्थानातील अस्पृश्यांचा समावेश केला नाही.  पण यानंतर येणाऱ्या माझ्या कोष्टकांतील आकडयात संस्थानी आकडे अंतर्भूत आहेत.

लोदियन कमिटीच्या रिपोर्टातील संकलनात्मक कोष्टक (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


अखिल हिंदुस्थानातील (ब्रम्हदेशाशिवाय) अस्पृश्य आणि एकूण हिंदूंची प्रांतनिहाय संख्या 
(PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

 

अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्यांची प्रांतवार संख्या (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

  1. श्री भास्करराव जाधव
  2. श्री गणेश आकाजी गवई
  3. राजकारण
  4. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवनपट
  • 126
  • 127
  • 128
  • 129
  • 130
  • 131
  • 132
  • 133
  • 134
  • 135
Page 131 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी