1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता

प्रकरण चौथे

मनुस्मृतीचा काळ अद्यापि नक्की ठरत नाही.  पण मनुस्मृती हल्ली ज्या स्थितीत आढळते ती गुप्त साम्राज्याच्या वेळची असावी असा तर्क करण्यास पुष्कळ जागा आहे.  ह्या वेळी बौध्द संस्कृतीचा पूर्ण नायनाट झाला नसला तरी ती घसरणीला खास लागली होती आणि त्याच मानाने ब्राह्मणी संस्कृतीची मेढही प्रतिष्ठित झाली होती.  इतर गोष्टी कशाही असोत, आमच्या पूर्वोक्त व्याख्येबरहुकूम असलेली अस्पृश्यता उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम म्हणजे सर्वच भारतखंडात रूढ झाली होती.  मानवधर्मशास्त्राच्या ऊर्फ मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायात चंडाल, पुक्कस, निषाद वगैरे मानववंशांची जी ऐतिहासिक मीमांसा केलेली आहे, ती शुध्द इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत निराधार आहे.  ह्या काळी वर्णव्यवस्था बौध्द संस्कृतीच्या शेगडीतून जळूनपोळून वर्णत्वाचा तिचा आत्मा नाहीसा होऊन हल्लीच्या जातिभेदाच्या स्वरूपाला येऊन पोहोचली होती.  चंडालादी स्वतंत्र मानववंश असून त्यांची उपपत्ती ब्राह्मण स्त्रिया आणि शूद्र पुरुष ह्यांची संकरजात अशी कारणे म्हणजे केवळ वर्णद्वेषाचे खूळ होय.  हे खूळ गुप्तकाळापासून पुढे आतापर्यंत सारखे वाढतच आहे.  वर्णसंकर झाला नाही असे कोणाचेही म्हणणे नाही.  पण हल्लीच्या सर्व जाती केवळ वर्णसंकरामुळेच झाल्या आणि ब्राह्मण शिवायकरून सर्व जाती वर्णसंकरजन्यच आहेत, आणि त्यातल्या त्यात अस्पृश्य वंश म्हटले की, केवळ वर्णसंकरापलीकडे त्याला अस्तित्वच नाही, ही उपपत्ती खास ऐतिहासिक नाही.  मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायातला चौथा श्लोक खालीलप्रमाणे आहे :

ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णां द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥

अर्थ  :   ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात; म्हणजे एकदा सृष्टिक्रमाने व मागून उपनयन संस्काराने.  शूद्र सृष्टिक्रमाप्रमाणे एकदाच जन्मतो.  ह्या चारांपेक्षा पाचवा असा वर्णच नाही.

पाचवा वर्ण नाही, आणि अस्पृश्य जातीची लोकसंख्या तर भारतात चोहोकडे पसरली आहे, हे पाहून त्यांच्या उपपत्तीची काळजी ह्या स्मृतिकाराला पडली.  आणि त्यांच्या हीनत्वाचा नगारा मोठयाने वाजविण्यासाठी वर्णसंकराशिवाय दुसरा तोडगा त्याला कोणता मिळणार ?  तो तोडगा त्याच अध्यायात श्लोक १२ मध्ये, येणेप्रमाणे वर्णिला आहे :

शूद्रादायोगवः क्षत्ता चंडालश्चाधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकराः ॥

अर्थ  :  शूद्र पुरुष आणि त्याहून श्रेष्ठ अनुक्रमे वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलटया शरीरसंबंधामुळे जी प्रजा होते तिला अनुक्रमे आयोगव, क्षत्ता आणि चांडाल अशी नावे आहेत; त्यांत शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांची जी संतती तिलाच मात्र चांडाल समजून अत्यंत नीच आणि अस्पृश्य मानण्यात आले आहे.  मनूने वर्णसंकराचा जो निषेध केला आहे तो प्रतिलोमाचाच, म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे.  ह्याच्या उलट जो अनुलोम संकर त्याचा निषेध केला नाही, इतकेच नव्हे तर उलट गौरवच केला आहे.  त्याच १० व्या अध्यायात खालील दोन श्लोक ध्यानात घेण्यासारखे आहेत.

शूद्रायां ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत्प्रजायते ।
अश्रेयान्श्रेयसीं जातिं गच्छत्यासप्तमाद्युगात् ॥६४॥
शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम् ।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च ॥६५॥

अर्थ  :  शूद्र कन्येला ब्राह्मणापासूनच कन्या झाली, त्या कन्येला पुनः ब्राह्मणापासूनच कन्या झाली, आणि अशा सात पिढया झाल्यावर ती अगदी ब्राह्मणच उपजली असे होते.  ह्याप्रमाणे शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो आणि ह्याचप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्यही समजावे.

ह्यावरून त्या काळच्या वर्णव्यवस्थेच्या कल्पना किती अनैतिहासिक, अस्वाभाविक, एकांगी आणि डोईजड झाल्या होत्या हे उघड होते.  अशा व्यवस्थेमुळे चोहोकडेच सर्वांचाच वर्णसंकर होऊन वर्णबाह्य अस्पृश्य जातींशिवाय शुध्द जात कोठेच उरली नव्हती; असा ह्या भयंकर तोडग्याचा खरा अर्थ होतो, हे त्या स्मृतिकाराच्या लक्षात आलेले दिसत नाही.  ह्यांत चार वर्णांतील पुरुशांचाच अपमान होतो असे नसून स्त्रीजातीलाही हीन मानल्यामुळे तिचाही भयंकर अपमान केला गेला आहे.  पुरुष म्हणजे बीज, स्त्री म्हणजे क्षेत्र, बीजालाच सर्व महत्त्व आणि क्षेत्राला काहीच नाही, अशी ही एकांगी उपपत्ती आहे.  दुसऱ्या भाषेत सांगावयाचे म्हटले तर दुसऱ्याच्या बायका बळकावायच्या आणि आपल्या बायकांना पडद्यात व सोवळयात डांबावयाचे ही हल्लीची मुसलमानांची नीती मनुस्मृतीत चांगली वर्णिलेली आहे.  'स्त्रीषु दुष्टासु जायते वर्णसंकरः' हा भगवद्गीतेचाही भावार्थ आहे.  तोही ह्याच काळाला शोभतो.  अस्सल बौध्द काळात असले अनुलोम-प्रतिलोम दोन्ही शरीरसंबंध होत होते, पण वरील कल्पनांचा गधा-गोंधळ मात्र नव्हता.  बौध्द संस्कृती किंबहुना तत्पूर्वीची खरी आर्यसंस्कृती निर्वीर्य झाल्यावरच असल्या एककल्ली विचारांना मान्यता मिळणे शक्य आहे.  सामान्य वर्णव्यवस्थेचे कसेही असो.  अस्पृश्य मानिलेल्यांच्या दुःखावर हा जो नवीनच विषारी डाग दिला गेला आहे तोच आमचा प्रस्तुत मुद्दा आहे.  वर्णद्वेष आणि वृत्तिलोभ ह्या जोडगोळीने मानीव अस्पृश्यांना हतवीर्य करून त्यांना कायमचे शारीरिक आणि बौध्दिक गुलाम बनवून, पुनः त्यांच्या वंशाची उपपत्ती अशी लावणे, म्हणजे अविवेकाचाच नव्हे तर अन्यायाचा कळस होय !

नुसती उपपत्ती लावूनच स्मृतिकार तृप्त झाले नाहीत.  ह्या मानीव वर्णसंकराच्या गुन्ह्याला खरी, कायमची आणि कडेलोटीची पुढील शिक्षा ह्याच १० व्या अध्यायात फर्माविण्यात आली आहे.

चंडालश्वपचानां तु बहिर्ग्रामात्प्रतिश्रयः ।
अपपात्राश्च कर्तव्या धनमेषां श्वगर्दभम् ॥५१॥
वासांसि मृतचेलानि भिन्नभांडेषु भोजनम् ।
कार्ष्णायसमलंकारः परिव्रज्या च नित्यशः ॥५२॥
न तैः समयमन्विच्छेत्पुरुषो धर्ममाचरन् ।
व्यवहारो मिथस्तेषां विवाहः सदृशैः सह ॥५२॥
अन्नमेषां पराधीनं देयं स्याध्दिन्नभाजने ।
रात्रौ न विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च ॥५४॥
दिवा चरेयुः कार्यार्थ चिह्निता राजशासनैः ।
अबांधवं शवं चैव निर्हरेयुरिति स्थितीः ॥५५॥
वध्यांश्च हनुः सततं यथाशास्त्रं नृपाज्ञया ।
वध्यवासांसि गृह्णीयुः शय्याश्चारभरणानि च ॥५६॥

अर्थ  :   चांडाल, श्वपच इत्यादी जातींनी गावाबाहेर राहावे; त्यांच्याजवळ फुटकी भांडीच असावीत; कुत्री आणि गाढवे हेच त्याचे धन; प्रेतावरील कपडे हीच त्यांची वस्त्रे; त्यांनी फुटक्या मडक्यांतच खावे; काळया लोखंडाचे दागिने ल्यावेत; नित्य भटकत असावे; इतरांनी त्याच्याशी कसलाही व्यवहार (सामोपचाराचाही) करू नये; त्यांचे विवाह त्यांच्यातच व्हावेत; त्यांना अन्न द्यावयाचे असल्यास दुसऱ्याकडून खापरांतून द्यावे; शहरांत किंवा खेडयात त्यांनी रात्री येऊ नये; दिवसा कामासाइी कायद्याने ठरविलेली चिन्हे धारण करूनच यावे; ते काम म्हणजे बेवारशी प्रेते नेणे, देहान्त शिक्षा झालेल्यांचा राजाज्ञेने वध करणे व त्यांचे कपडे, दागिने वगैरे घेणे, हे होय.

वर छंदोग्य उपनिषदाच्या ५ व्या अध्यायाच्या २४ व्या खंडातील ४ था श्लोक (पान २३ पहा) उध्दृत केलाच आहे.  त्यात स्पष्ट म्हटले आहे की चांडाळाच्या उष्टे दिले तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुती दिल्याप्रमाणे पुण्य आहे.  हे छांदोग्याचे औदार्य कोणीकडे आणि ज्या मनुस्मृतीच्या ४ थ्या अध्यायातील खालील श्लोकांत शूद्रालाही उच्छिष्ट देऊ नये आणि चांडाल-पुक्कसांच्या तर वाऱ्यालाही उभे राहू नये असे फर्माविले आहे, तिचा कडकडीत तुसडेपणा कोठे !  बुध्दपूर्व आणि बुध्दोत्तर काळात केवढा हा फरक !

न शुद्राय मतिं दद्यात् नोच्छिष्टं व हविष्कृतम् ।
न चास्योपदिशेध्दर्म न चास्य व्रतमादिशेत् ॥८०॥

अर्थ  :  शूद्राला सल्ला देऊ नये; उच्छिष्ट किंवा हवन होऊन शिल्लक उरलेले अन्न देऊ नये; प्रत्यक्ष धर्मोपदेश किंवा प्रायश्चित्तोपदेशही देऊ नये.

साध्या शूद्रावर जर असा बहिष्कार, तर अतिशूद्राविषयी खालील श्लोकात वर्णिल्याप्रमाणे कट्टा द्वेष असावा ह्यात काय नवल !

न संवसेच्च पतितैर्न चांडालैर्न पुल्कसैः ।
न मुखैर्नावलिप्तैश्च नान्त्यैर्नान्त्यावसायिभिः ॥७९॥

अर्थ  :  पतित, चांडाल, पुल्कस, मूर्ख, गर्विष्ठ, अंत्य व अंत्यावसायी ह्यांच्याबरोबर (एका वृक्षाच्या ठिकाणी) एकत्र बसू नये.  ह्या श्लोकावर भाष्यकारांनी खालील अर्थाची पुरवणी जोडली आहे; - शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी निषादापासून झालेला जातीने पुल्कस होत असतो; अंत्य म्हणजे परीट, चांभार, बुरुड वगैरे; चांडालापासून निषाद स्त्रीच्या ठिकाणी झालेले अंत्यावसायी होत.

मनुस्मृतीनंतर हल्लीच्या स्वरूपात आढळणाऱ्या अठरा महापुराणाचे व अनेक उपपुराणांचे विशाल मध्ययुगीन संस्कृत वाङमय लिहिले जात होते.  ह्याचा बौध्द जैन संस्कृतीशी उघड हेवादावा आणि विरोध चालत होता.  ह्या (सुमारे ५०० वर्षांच्या) काळात ब्राह्मणी संस्कृतीची बौध्दादिकांच्या विरोधाने विस्कटलेली घडी पुनः बसून अर्वाचीन समाजस्थितीचा पाया घातला जात होता.  ह्या वाङमयातून उतारे देऊ गेल्यास ग्रंथविस्तार मर्यादेपलीकडे जाईल.  अस्पृश्यतेची जी घडी वरील स्मृतीने बसविली, ती अगदी आजतागायत जशीच्या तशीच शाबूत दिसत असल्यामुळे त्या पुराणवाङमयातून नवीन ऐतिहासिक माहिती मिळण्याचीही काही आशा नाही.  म्हणून जी मिळते, ती देऊन जागा अडविणे इष्ट दिसत नाही.  वर्णसंकराची उपपत्ती जुळवून क्षत्ता, आयोगव इत्यादी ज्या अनेक संकरजन्य उपजातींचा उल्लेख मनुस्मृतिकार करतात त्यांचा आता, किंबहुना पूर्वीही, प्रत्यक्ष मागमूस आढळत नाही.  चांडाल, पुल्कस, निषाद वगैरे थोडया नावांपलीकडे आजच्या समाजस्थितीत महार, मातंग, ढोर, धेड, पारिया, चिरुमा, नामशूद्र, मेघवाल, बळहई वगैरे अनेक मानीव अस्पृश्य जातींची नावे आढळतात त्यांचा उल्लेख मनु अथवा इतर स्मृतींत किंवा पुराणांतूनही आढळत नाही आणि ह्या जाती तर ह्या विशाल देशाच्या सर्व अंगातून व कानाकोपऱ्यातून राजरोस आढळतात.  ह्यावरून एवढेच सिध्द होत आहे की आजकालच्या मानीव अस्पृश्यांची उपपत्ती केवळ वर्णव्यवस्थेच्या काल्पनिक धोरणावरून लावण्याचा आम्ही जो वर प्रयत्न केलेला आहे त्याच दिशेने पुढील शोधकांनी चालविणे अधिक शास्त्रीय ठरेल.

वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे स्मृती व पुराणे हल्ली प्रचलित असलेल्या अनेक जातींची अथवा त्यांच्या नावांची मीमांसा करण्याची योग्य साधने नव्हेत, ह्यात काही मोठेसे आश्चर्य आहे असे मुळीच नव्हे.  हे ग्रंथ म्हणजे आताच्या 'सेन्सस रिपोर्ट' अथवा 'एन्थोग्राफिक सर्व्हे' ह्याप्रमाणे आधुनिक शास्त्रीय पध्दतीनुसार लिहिलेले ग्रंथ नव्हते.  बोलून चालून हे पक्षाभिनिविष्ट ग्रंथ होत.  अनुलोम-प्रतिलोम शरीरसंबंध बंद पाडून काही विशिष्ट मानीव वर्णांचा टेंभा मिरविण्याचा त्यांचा उघड उद्देश होता.  हा उद्देश साध्य करण्यास त्यांना कृत्रिम इतिहास प्रतिष्ठित करावयाचा होता.  आजदेखील डोईजड जाती अथवा वर्ग, असले बनावट इतिहास तयार करून जगाला झुलवीत आहेतच, मग आमच्या स्मृतिपुराणांनी तर मानवी स्वभावाविरुध्द काय केले आहे म्हणून आश्चर्य मानावयाचे ?  अगोदर वर्णसंकराची उपपत्ती बसवावयाची, मग त्या संकराला निषिध्द मानावयाचे आणि मग क्षत्ता, आयोगव इत्यादी संस्कृत ऊर्फ कृत्रिम नावे द्यावयाची हा सर्व प्रकार केवळ अहंमन्यतेचा विलास होय.  महार, ढोर, पारिया, चिरुमा, नामशूद्र, बळहई इत्यादी आजकालच्या 'अस्पृश्यांची' नावे निरनिराळया प्रांतांतून आढळतात, ती ह्या पुराणग्रंथांतून का आढळत नाहीत, हाही प्रश्न उद्भवतच नाही.  भिन्न धंदे, भिन्न परिस्थिती वगैरेवरून ही नावे ह्या ग्रंथानंतरच्या अलीकडच्या काळात पडलेली असावीत.  ह्या बाबींचा विचार दुसऱ्या खंडातील 'नावांच्या व्युत्पत्ती' ह्या प्रकरणात करण्यात आला आहे.  ह्यांतील काही नावे पुराण-स्मृतिग्रंथांच्या पूर्वीही होती.  उदाहरणार्थ, चांडाल, पुल्कस (पुलय), मेघ (मघ) वगैरे.  पण त्या जमातींचीही पूर्वपीठिका समाजशास्त्रान्वये ठरविताना स्मृतीचा पुरावा घेणे अगदीच अप्रयोजक आहे, हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.

भारतीय निराश्रित साह्यकारी व साह्यकारक मंडळी

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी 

ही संस्था सन १९०६ च्या ऑक्टोबरच्या १८ व्या तारखेला स्थापन झाली.  ही धर्मार्थ संस्था या सदराखाली सन १८६० च्या २१ व्या कायद्याप्रमाणे नोंदलेली आहे.

या संस्थेचे सध्याचे कार्यकारी मंडळ

सर नारायण गणेश चंदावरकर - अध्यक्ष
शेट दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला, जे. पी. - उपाध्यक्ष
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए. -जनरल सेक्रेटरी
रा. रा. व्ही. एस. सोहोनी -ऍसिस्टंट जनरल सेक्रेटरी
रा. रा. पी. बी. गोठोस्कर, बी.ए. - ऑनररी ट्रेझरर
डॉ. कु. काशीबाई नवरंगे, बी.ए., एल.एम. ऍंड एस.
श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे
रा.रा. लक्ष्मण बाळकृष्ण नायक, बी.ए.
रा. रा. जी. बी. त्रिवेदी, बी.ए.
रा. रा. अमृतलाल व्ही. ठक्कर, एल. सी.ई.
रा. रा. एन. जी. वेलिनकर, जे. पी. एम. ए., एल.एल.बी.
रा. रा. एन. बी. पंडित, बी.ए.

ट्रस्टी
शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला, जे.पी.
रा. रा. हरी सीताराम दीक्षित, बी.ए., एल.एल.बी.
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए.

संस्थेसंबंधी सर्व माहिती, रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए. जनरल सेक्रेटरी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांजकडे, डिप्रेस्ड क्लासेसमिशन स्कूल परळ, येथे मिळेल.

पुरवणी सुबोधपत्रिका ता. ६ मार्च १९१०

भारतीय निराश्रित साह्यकारक मंडळी

स्थापना
शके १८२८ कार्तिक शुद्ध प्रतिपदा, ता. १८ ऑक्टोबर सन १९०६
नामदार न्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरकर - अध्यक्ष
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे -  जनरल सेक्रेटरी

लोकसंख्या  :  हिंदुस्थानांतील एकंदर लोकवस्ती २९,४३,६१,०५६ पैकी एकून हिंदूंची संख्या २०,७१,४८,०२६.  पैकी अस्पृश्य मानलेल्या लोकांची संख्या ५,३२,०६,६३२ सहा हिंदूंमध्ये किंवा ४ हिंदूंमध्ये एक अस्पृश्य !  १९०१ सालची खानेसुमारी पहा.

हेतू  :  हिंदुस्थानांतल महार, मांग, चांभार, पारिया वगैरे (विशेषेकरून पश्चिम हिंदुस्थानांतील) निकृष्ट वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांना (१) शिक्षण, (२) कामधंदा, (३) ममतेची आणि समतेची वागणूक, (४) धर्म, नीति, आरोग्य आणि नागरिकता इत्यादीविषयक उदार तत्त्वांचा उपदेश व अशाच इतर साधनांच्याद्वारे आत्मोन्नती करण्याचे कामी साहाय्य करणे, हा ह्या मंडळीचा हेतू आहे.  हिच्या विद्यमाने सध्या खालील संस्था काम करीत आहेत.

१.  मुंबई  :  परळ, भायखळा, कामाठीपुरा, देवनार येथे ४ शाळांतून ४०० च्या वर मुले शिकत असतात.  परळ आणि भायखळा येथे रविवारी सकाळी गीतावर्ग व सायंकाळी भजन समाज भरतो.  शिवाय शनिवारी कीर्तने, पुराणे, व्याख्याने इत्यादी होतात.  निराश्रित सदनांस ह्या कामी वाहिलेल्या ४ स्त्रिया व ३ पुरुष गरिबांच्या घरोघर जाऊन त्यांचा समाचार घेणे, शुश्रूषा करणे वगैरे कामे करितात.  परळच्या शाळेत पुस्तके बांधण्याचा व काळबादेवी रोडवरील बायबल सोसायटीजवळच्या दुकानात कातडयाचा कारखाना चालू आहे.  मंडळीच्या 'प्युरिटी सर्व्हंट' नावाच्या इंग्रजी मासिक पुस्तकात ठिकठिकाणचे मासिकवृत्त प्रसिद्ध होते.  वार्षिक वर्गणी २॥ रु. सेक्रेटरी : रा. वा. स. सोहनी, ग्रांटरोड

२.  पुणे  :  १ दिवसाची, २ रात्रीच्या, १ रविवारची शाळा.  २०० विद्यार्थी.  १ भजन समाज.  सेक्रेटरी  :  रा. ए. के. मुदलियार, रास्तेपेठ

३.  मनमाड  :  १ रात्रीची शाळा. ४५ विद्यार्थी. सेक्रेटरी :  रा. मोहनसिंह मोतीसिंह

४.  इंदूर  :  १ रात्रीची शाळा.  २० विद्यार्थी.  सेक्रेटरी  : रा. रा. गो. मिटबावकर, ब्राह्मसमाज

५.  अकोला  :  २ रात्रीच्या शाळा.  ७२ विद्यार्थी.  भजनसमाज.  सेक्रेटरी :  एस. सी. होसळळी, ब्यारिस्टर

६.  उमरावती  :  २ रात्रीच्या शाळा.  ५३ विद्यार्थी.  सेक्रेटरी :  रा. गोविंदराव काणे, वकील.

७.  दापोली  :  सेक्रेटरी :  डॉ. वा. अ. वर्टी

८.  महाबळेश्वर  :  १ विणण्याचा कारकाना.  ५० निराश्रित माणसांचा परिवार.  सेक्रेटरी :  मिसेस जेम्सन.

९.  नाशिक  :  एजंट रा. गणेश आक्काजी गवई.  सेक्रेटरी : रा. पाटणकर वकील.

१०.  ठाणे :  सेक्रेटरी :  डॉ. संतुजी रामजी लाड, बाँबे रोड.

११.  मंगळूर  :  १ दिवसाची शाळा, १ बोर्डिंग, १ विणण्याचा कारखाना, १ वसाहत.  सेक्रेटरी :  रा. के. रंगराव, वकील.

१२.  मद्रास :  २ दिवसाच्या, २ रात्रीच्या शाळा, १३० विद्यार्थी, १ रविवारची शाळा.  सेक्रेटरी :  मि. व्ही. गोविंदन. बी.ए.

ह्याशिवाय कोल्हापूर, राजकोट, कलकत्ता रावळपिंडी, डेहराडून वगैरे ठिकाणी ह्याच धर्तीवर कामे चालली आहेत.

इ.स. १९०९ साली नुसत्या मुंबई येथील संस्थांचा ७,३५७ रुपये ११ आणि ५॥ पै इतका खर्च झाला.  मंडळीचे दरसाल वर्गणीचे उत्पन्न सुमारे ३,००० रु.चे आहे.  बाकीची तूट अकस्मात देणग्यांच्या द्वारेच कशीतरी भरून काढावी लागते.  एकषष्ठांश भारताला साह्य करण्याच्या कामी किती मदत पाहिजे, हे वेगळे सांगावयाला नकोच.

वि. रा. शिंदे
जनरल सेक्रेटरी
राममोहन आश्रम,
गिरगांव - मुंबई

निराश्रित साहाय्यक मंडळी

महिला समाज

वरील समाजाचा पहिला वार्षिक उत्सव, मदनपुरी, मार्लेड रोडवरील इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चार माडयांसमोरील मंडपात गेल्या ता. २० रोजी सायंकाळी ४॥ वाजता श्री. सौ. लक्ष्मीबाई चंदावरकर यांच्या अध्यखतेखाली साजरा करण्यात आला.  या प्रसंगी सौ. लेडी चंदावरकर, मिसेस बोवेन, मिसेस निकंबे, मिस काब्राजी, सौ. जमनाबाई सक्कई, मिसेस पंडित, मिसेस परुळकर, कु. कृष्णाबाई जव्हरे, सौ. चंद्राबाई यंदे, सौ. लक्ष्मीबाई रानडे, सौ. सुशीलाबाई वैद्य, मिसेस जयकर, मिस ताराबाई केळकर, सौ. काशीबाई भोसले, श्री. जनाबाई रोकडे इत्यादी सुमारे ५० आर्यभगिनी व निराश्रित समाजाच्या सुमारे पाचशे स्त्रिया व मुली हजर होत्या.

सौ. लेडी चंदावरकर या अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यावर प्रार्थनेचे पद म्हणण्यात आले व निराश्रित साहाय्यक मंडळीच्या शाळेतील लहान मुलींनी बाहुल्यांचे खेळ व गाणी म्हणून दाखविली.  नंतर सौ. सुशीलाबाई वैद्य व ताराबाई केळकर यांनी दिलरुबा वाजवून सुस्वर गाणी म्हणून दाखविल्यावर निराश्रित साहाय्यक मंडळीच्या महिला समाजाच्या सेक्रेटरी सौ. जनाबाई यांनी भायखळयाच्या शाळेचा पुढील वार्षिक रिपोर्ट वाचून दाखविला :

वार्षिक रिपोर्ट

निराश्रित सहाय्यक मंडळीची स्थापना झाल्यावर लवकरच चालकांना असे आढळून आले की, निराश्रितवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या बायकामुलांच्या घरगुती अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यांच्याशी अगदी मिळूनमिसळून त्यांच्या हिताची कामे सतत करीत राहिल्याशिवाय मंडळीच्या हेतू, नुसत्या काही शाळा चालवून, मुळीच साधणार नाही.  ह्या कामाला वाहून घेणाऱ्या काही थोडया भगिनींची साहाय्यता मिळाल्यावर 'निराश्रित सदन' ह्या नावाची संस्था ता. २१ मे १९०७ रोजी ग्लोब मिलजवळील चाळीत उघडण्यात आली. प्रथमपासून १९१० जूनअखेर ह्या संस्थेच्या खर्चासाठी एका परोपकारी गृहस्थाकडून दरमहा नियमाने १०० रु. मिळत असत.  एवढीच काय ती मदत ह्या सदनास होती.  तीही आता बंद पडल्यामुळे खर्चाच्या दृष्टीने सदनाची स्थिती चिंता बाळगण्यासारखी झाली आहे.  तथापि अजूनपर्यंत ईश्वरकृपेने सर्व कामे तशीच चालून, काही नवीही उत्पन्न होत आहेत.  

सन १९१० जून अखेर ह्या सदनाचे काम परळ येथेच चालले होते.  त्यानंतर सौ. कल्याणीबाई सैय्यद ह्यांची जोड सदनास मिळून परळप्रमाणेच भायखळा येथेही काम चालविण्यास सवड मिळाली व त्यामुळे गेल्या वर्षी एकंदर १५ सभा भरविण्यात आल्या.  व या प्रसंगी स्वामी धर्मदास. रा. रा. ब. शिंदे, रा. जव्हेरे, रा. खरे, सौ. गुलाबबाई जव्हेरे, रा. नाईक. रा. नाडकर्णी, सौ. लक्ष्मीबाई गाडगीळ व रा. गोपाळ कृष्ण देवधर यांनी भजने, पुराणे व व्याख्याने देऊन सभेच्या कामाला प्रोत्साहन दिले.  याशिवाय निरनिराळया प्रसंगी हळदीकुंकवाचे समारंभही साजरे करण्यात आले.

महिला समाज  :  वर सांगितल्याप्रमाणे गतसालच्या चातुर्मास्यात हळदीकुंकवाचे समारंभ निराश्रितवर्गाच्या प्रमुख बायकांनी आपल्या मोहल्ल्यात मोठया उत्साहाने साजरे केले व त्याचा खर्चही आपणच सोसला.  ह्या गोष्टीचा शेवटी परिणाम असा झाला की, आपला एक निराळा समाजच असावा असे ह्यांना वाटू लागले.  म्हणून गेल्या हरतालिकेच्या मुहूर्ताने 'आर्यमहिलासमाजा'च्या धर्तीवर भायखळा येथे एक महिला समाज स्थापन झाला.  आरंभी त्याच्या १८ स्त्रिया सभासद झाल्या पण वर्षअखेर त्यांपैकी ९च नावे पटावर राहिली आहेत.  प्रत्येक बाई दरमहा निदान एक आणा तरी नियमाने वर्गणी देत असते.  आपले इलाखाधिपती नामदार सर जॉर्ज क्लार्क ह्यांचा गेल्या नवंबरमध्ये विवाह झाल्यावेळी त्यांच्या अभिनंदनार्थ जी बायकांची सभा झाली, तेव्हा ह्या समाजाच्या सभासदांनी मोठी मदत केली.

शिवणकामाचा वर्ग  :  भारखळा येथील शाळेत हा वर्ग शनिवार-रविवार खेरीजकरून रोज भरतो.  तेव्हा सरासरीने ४५ बायका आपले घरचे शिवण येथे शिवून घेऊन जातात.  ह्या वर्गासाठी एक शिवण्याचे यंत्र मुख्यतः सौ. लक्ष्मीबाई गाडगीळ ह्यांच्या श्रमामुळे मिळाले आहे.  सौ. शांताबाई खरे व कुमारी सीताबाई मराठे ह्यांनीही ह्या यंत्रासाठी वर्गणी जमविली आहे.

समाचार  :  घरोघर भेटीला जाऊन समाचार घेण्याचे काम वर्षभर सतत चालले होते.  ह्या कामाचा फायदा आमच्या निराश्रितवर्गाच्या भगिनींना कितपत मिळतो, हे आम्हांस सांगवत नाही; परंतु त्याचा आम्हां स्वतःला मात्र फारच मोठा अनुभवाचा फायदा मिळत आहे.  ह्या लोकांसाठी नम्रभावाने व कराराने काम करणाऱ्या मंडळीचा संग्रह व्हावा हा एक ह्या सदनाचा जो हेतू आहे, तो सिद्ध होणार असेल तर त्याच कामामुळे होईल असे आम्हास आता कळून चुकले आहे.

सौ. जनाबाई शिंदे यांनी वरील रिपोर्ट वाचून दाखविल्यानंतर सौ. कल्याणबाई यांनी परळ येथील निराश्रित सदनाच्या कामाच्या हकीगतीचा पुढील रिपोर्ट वाचून दाखविला.

परळ येथील कामाची हकीगत

सदनाच्या परळ येथील कामाचा चार्ज मजकडे १९१० जानेवारीपासून देण्याता आला.  तेव्हापासून गेल्या वर्षअखेर खालील कामे झाली :

१.  घरातील वर्ग (होम क्लास) :  १९०९ ऑक्टोबरपासून पत्र्याच्या चाळीत एक व ग्लोबमिलजवळील चाळीत एक असे दोन वर्ग सुरू करण्यात आले.  पहिल्यात ७८ महार-चांभाराच्या बायका आठवडयातून दोन वेळ १॥ तास शिकत होत्या व दुसऱ्यात १० बायका होत्या.  पहिला मार्चपर्यंत व दुसरा फेब्रुवारीपर्यंत चालून हे दोन्ही वर्ग बंद पडले.  घरच्या कामामुळे किंवा केवळ कंटाळयामुळे बायका नीट जमेनाशा झाल्या.  त्या पुढे ह्या दोन्ही वर्गांत येणाऱ्यांपैकी ३४ बायका परळ येथील सदनातच शिकावयास येऊ लागल्या, एवढाच काय तो ह्या वर्गाचा परिणाम झाला.

२.  प्रसूती आणि शुश्रूषा :  गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूती करण्यात आली पैकी एकीची स्थिती फारच कठीण होती.  म्हणून तिला 'कामा हॉस्पिटल' मध्ये पाठविण्यात आले.  तेथे तिची चांगल्यारीतीने सुटका झाली.  घरोघरी आजारी बायकांची केव्हा केव्हा शुश्रूषा करण्यात आली व पुष्कळांना सेवासदनाच्या दवाखान्याचा लाभ देण्यात आला.

३.  सभा :  महिन्यातून एक किंवा दोन बायकांच्या सभा होत असत; त्या मेपासून सप्टेंबरपर्यंत बंद होत्या.  त्या वेळी पुराणातील काही भागांचे वाचन किंवा एखाद्या विषयावर सोपे व्याख्यान होत असे.  ह्या कामी श्रीमती सीताबाई अनगळ, भिमाबाई ठाकूर, सौ. गोपिकाबाई लेले, रा. मोरोपंत खरे, रा. नाईक, वगैरे मंडळीची मोठी मदत झाली.

४.  इतर कामे :  पोलीस कमीशनरकडून बेवारशी बालके व मुली मिळून ५ आली.  त्यांची निगा ठेवली.  त्यांपैकी चांभाराच्या २ मुली मालाड येथील सेवासदनाच्या आश्रमात पाठविल्या.  बोर्डिंगातील २ मोठया मुलींस घरी लिहिणे-वाचणे शिकविले व परळ येथील बोर्डिंगाची साधारण देखरेख ठेवली.

ह्या समाजास मदत करण्यासाठी मुंबईतील निरनिराळया वरिष्ठ वर्गातील प्रमुख स्त्रियांची एक कमेटी नेमण्यात आली आहे.  सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तिचे चिटणीस आहेत.  शाळेतील मुलींना ह्या समाजाकडून लहान स्कॉलरशिपा देण्याचे ठरले आहे.  उदार भगिनींनी ह्या सत्कार्यास हातभार लावावा अशी त्यांस सविनय विनंती आहे.

जनाबाई शिंदे

सेक्रेटरी
राममोहन आश्रम,
गिरगांव, मुंबई.

''स्वार्थावर लाथ मारून गळयात झाळी अडकवून संस्थेकरिता-अर्थात आमच्या लोकांकरिता - संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदार फिरतात व त्यांना त्यात कितीही अल्प यश आले तरी ते पर्वा न करता चंदनासारखे स्वतः झिजून दुसऱ्यांना-आम्हांला-सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू ठेवतात त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतांपेक्षा आम्हांला यंत्किंचितही कमी वाटत नाही.  कित्येकांना ती जास्त वाटेल.''

गणेश आकाजी गवई
डी. सी. मिशनच्या महाराष्ट्र परिषदेत केलेले भाषण
पुणे, १९१२

''इतिहास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या चळवळींचा उगम
थोडयाशा व्यक्तींच्या कार्यात सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या व्यक्ती म्हणजे ज्यांची प्रथम प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे गृहस्थ होत.  त्यांचया कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसदविवेकबुध्दी जागृत झाली.''

न्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरकर
डी.सी. मिशनची अस्पृश्यतानिवारक परिषद
मुंबई, १८१८

''शिंद्यांचा जिला भरीव हातभार लागला नाही अशी लोकसेवेची व समाजोन्नतीची चळवळ दाखवून देणे कठीण आहे.  राजकारण, समाजकारण, धर्मकार्य, शिक्षणकार्य इतकेच नव्हे तर वाङमयसेवा आणि इतिहाससंशोधन या सर्वांत शिंद्यांचा भाग आहे, आणि फार महत्त्वाचा भाग आहे.  ज्या काळी विधवाविवाहासारखे साधे प्रश्न सुटणे दुरापास्त होते अशा त्या घनदाट धर्मवेडाच्या काळात अस्पृश्योध्दाराची चळवळ सुरू करणे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढणे, इतकेच नव्हे तर अस्पृश्यांत जाऊन त्यांच्यापैकी एक झाल्याप्रमाणे त्यांच्यात वागणे या गोष्टींसाठी अतुल स्वमतधैर्याची, एवढेच नव्हे तर मूलमार्गी बुध्दीची व समाजाविषयी खऱ्या कळकळीचीही गरज होती.  इतक्या व्यापक व सूक्ष्म दृष्टीच्या कार्यकर्त्याची दृष्टी सबंध देशाइतकी विशाल विस्तृत असावी लागते.  म्हणूनच श्री. शिंदे सामाजिक चळवळीप्रमाणेच अनेक राजकीय चळवळीतही भाग घेताना दिसत.''

न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी
महाराष्ट्र साहित्य संमेलन
नागपूर, १९३३

''मला राहून राहून एका गोष्टीविषयी दुःख होते.  अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठलरावांनी.  त्या कामी कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी देशभर जागृती घडवुन आणली.  ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळण्याचे श्रमही त्यांचेच.  पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हा जेव्हा उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ज्यांनी ह्या बाबतीत केवळ वाचिक कार्य केले आहे अशांनाच जागृतीचे श्रेय अर्पण करण्यात येते व भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी व विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशील बहिष्कार घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाही.  अशा संघटित बहिष्काराने सत्याचा अपलाप होतो.''

वामन सदाशिव सोहोनी
आत्मनिवेदन, मुंबई, १९४०

''विठ्ठल रामजी शिंदे हे माझ्या चार गुरुंपैकी एक होते.  माझ्या जन्मदात्यानंतर मी त्यांनाच मानतो.  त्यांच्या पायांशीच मी सार्वजनिक कार्याचे धडे घेतले.  माझ्यापेक्षा ते वयाने लहान असले तरी राष्ट्रहितासाठी करावयाच्या चळवळीबाबातच्या अभ्यासात त्यांची फार मोठी प्रगती होती.  ही गोष्ट सर्वज्ञात आहे, की मुंबई प्रांताकडील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे ते जनक होत.  पंजाब व उत्तरप्रदेश सोडला तर सर्व भारतातील या प्रकारच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होते.''

अमृतलाल व्ही. ठक्कर ऊर्फ ठक्करबाप्पा
इंडियन सोशन रिफॉर्मर
६ एप्रिल १९४४

भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची संस्थापना

तारीख १८ ऑक्टोबर १९०६ रोजी कार्तिकी वर्षप्रतिपदेचा शुभ दिवस आला.  दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील प्रार्थनासमाजाच्या उदार उपाध्यक्षांनी अशा मंडळीची स्थापना होऊन काम सुरू व्हावे म्हणून एक हजार रुपये दिले होते.  पाडव्याच्या शुभ दिवशी सकाळी नऊ वाजता (१८ ऑक्टोबर १९०६) एल्फिन्स्टन रोड स्टेशनलगतच्या मुरारजी वालजीच्या बंगल्यात मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरिता गावातील चार शिष्ट मंडळी जमली.  मंडळीचे अध्यक्ष नामदार न्यायमूर्ती चंदावरकर ह्यांनी जमलेल्या मुलांना पहिला धडा घालून देऊन मंडळीचे काम सुरू करण्यापूर्वी आपल्या भाषणात खालील अर्थांचे सूत्रवाक्य सांगितले की, ''ह्या नीच मानिलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःलाच वर आणीत आहो.  हे पवित्र कार्य करीत असता ह्या लोकांचा आम्ही उध्दार करणार, हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणात न शिरो आणि आम्हा सर्वांना ह्या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उध्दार होणार आहे.  असा साधा आणि सात्त्विभाव आम्हांमध्ये निरंतर जागृत राहो.''  आणि ह्या भावाला अनुसरूनच आज दोन वर्षे मंडळीचे काम चालले आहे.

हेतू

हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, धेड, पारिया वगैरे (विशेषेकरून पश्चिम हिंदुस्थानातील) निकृष्ट वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांना (१) शिक्षण, (२) कामधंदा, (३) ममतेची आणि समतेची वागणूक, (४) धर्म, नीती, आरोग्य आणि नागरिकता इत्यादीविषयक उदार तत्त्वांचा उपदेश व अशा इतर साधनांच्या द्वारे आत्मोन्नती करण्याचे कामी साहाय्य करणे, हा ह्या मंडळीचा हेतू असून हिच्या विद्यमाने सध्या खालील संस्था काम करीत आहेत.


शाळा

जी. आ. पी. परळ स्टेशनजवळीत नंबर १ ची इंग्रजी-मराठी शाळा आहे.  येथे हल्ली मराठी मूळाक्षरांपासून तो इंग्रजी चार इयत्तांपर्यंत शिक्षणाची उत्तम सोय केली आहे.  मुलगे १९० आणि मुली ३० शिकत आहेत.  कर्ुल्याजवळ देवनार येथील कचरापट्टीत नंबर २ ची प्राथमिक शाळा आहे.  तीमध्ये ४१ मुले आणि १ शिक्षक आहे.  भायखळा येथे नंबर ३ ची प्राथमिक शाळा आहे.  तीमध्ये १०१ मुले आणि ३ शिक्षक आहेत.  एकंदर मुलांची संख्या सरासरीने ५०० असते.  

जे. जे. हॉस्पिटलसमोर भंगी लोकांकरिता १ व महालक्ष्मी स्टेशनाजवळील कचरापट्टीत १ अशा दोन दिवसाच्या व एक रात्रीची अशा तीन गुजराथी शाळा चालू आहेत.  त्यांत १२५ मुले आहेत.

पुस्तक बांधण्याचे काम

मुलांना ५ तास सारखे शिकण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून व काहीतरी हातकाम यावे म्हणून दररोज दोन तास मोठया मुलांना परळच्या शाळेत पुस्तके बांधण्याचे व लहानमोठया वह्या, ब्लॉटिंग पॅड्स वगैरे तयार करण्याचे काम शिकवण्यिात येते.


उद्योगशाळा

सन १९१२ एप्रिलपासून परलोकवासी शेठ एन. एम.वाडिया ह्यांचया इस्टेटीतून दरमहा ५०० रु. तीन वर्षेपर्यंत मिळणार असल्यामुळे मंडळीने एक उद्योगशाळा उघडली आहे.  त्यात सुतारी व शिवणकाम शिकविले जाते.


शिवणकाम

मुलींना व गिरण्यांतून काम करू न इच्छिणाऱ्या निकृष्ट वर्गातल्या, पण अब्रुदार बायकांना घर बसल्या आपले व मुलांचे कपडे शिवता यावे म्हणून त्यांना साधे शिवणकाम शिकविण्याची व्यवस्था परळच्या शाळेत केली आहे.  सध्या एक चांभाराची बाई शिकून तयार झाली आहे.


पुस्तकालय

शेठ तुकाराम जावयी, मेसर्स बाबजी सखाराम आणि कंपनी व मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी वगैरेंच्या साहाय्याने ३०४ पुस्तके जमविली आहेत.  गेल्या वर्षी ह्यांपैकी २५८ पुस्तके वाचण्याकरिता देण्यात आली.  वाचनालयात २ देनिके, ५ साप्ताहिक पत्रे आणि ४ मासिक पुस्तके ठेवण्यात येत असतात.


मैदान क्लब

तरुण मुलांनी वाईट नादाला लागू नये म्हणून त्यांचा एक क्रिकेट फुटबॉल क्लब आहे.  विशेषेकरून शिमग्यासारख्या सणात चांदण्यारात्री शिक्षक लोकांच्या नजरेखाली आटयापाटया वगैरे खेळ खेळण्यात येतात.  सन १९०७ सालच्या होळीच्या दिवशी खेळांत हुशार ठरलेल्या गडयांस, सर भालचंद्र कृष्ण ह्यांचया हस्ते बक्षिसे वाटण्यात आली व वरील क्लब उघडण्यात आला.  हल्ली ४० मेंबर व क्रिकेटच्या तीन टोळया आहेत.  व्यायामाशिवाय ह्या क्लबमार्फत मधूनमधून व्याख्याने, संमेलने, वनभोजने इत्यादी ज्ञानवृध्दी, स्नेहवृध्दी आणि करमणूक करण्याचेही प्रकार होत असतात.


देवनार कचरापट्टी

येथे सुमारे ५०० म्युनिसिपल कामकरी अंत्यज मानिलेल्या लोकांची वसाहत आहे.  ही मुंबई म्युनिसिपालिटीच्या मालकीची जागा असून म्युनिसिपालिटीच्या हद्दीबाहेर म्हणजे ठाणे जिल्ह्यात असल्याने मंडळीने पुष्कळ प्रयत्न करूनही ह्या लोकांच्या शिक्षणाची सोय करण्याचा म्युनिसिपालिटीस अधिकारच नाही, असे शेवटी ठरले; आणि मालकी मुंबई म्युनिसिपालिटीची आहे म्हणून ठाणे जिल्ह्यातूनही शिक्षणाची व्यवस्था अद्यापि झाली नाही !  मिळून आज कित्येक वर्षे इतक्या लोकांची उणीव भरून निघाली नाही.  शेवटी तेथे वरील शाळा आपल्याच खर्चाने उघडून मंडळीने गरज भागविली.  हल्ली शेठ हाजी युसफ हाजी इस्मायल ह्यांच्या उदार मदतीने एक झोपडी बांधून तिच्यात एक दिवसा आणि एक रात्री अशा शाळा चालू आहेत.  शिवाय मंडळीकडून मधून मधून व्याख्याने, कीर्तने, बक्षीस-समारंभ वगैरे होत असतात.  


वाङमय

अस्पृश्य मानिलेल्या लोकांची कठीण स्थिती वरिष्ठ लोकांच्या नजरेस यावी व त्यांची सहानुभूती मिळावी, म्हणून इंग्रजीत तीन लहान पुस्तके छापून त्यांच्या पुष्कळ प्रती फुकट वाटण्यात येत आहेत.  शिवाय प्रमुख इंग्रजी, मराठी आणि गुजराथी पत्रांतून वेळोवेळी ह्या लोकांच्या स्थितीसंबंधी व कामासंबंधी लेख येत असतात.


निराश्रित सेवासदन

केवळ शाळा आणि दवाखाने स्थापिल्याने आणि मधूनमधून व्याख्याने दिल्याने ह्या लोकांची गृहस्थिती आणि सामाजिक स्थिती सुधारावयाची हा मंडळीचा जो मुख्य हेतू; तो अंशतःही पूर्ण व्हावयाचा नाही.  ह्या कामी काही स्वार्थत्यागी आणि श्रध्दाळू माणसांनी आपल्याला वाहूनच घेतले पाहिजे; त्यांनी ह्या लोकांच्या वस्तीत राहून, त्यांचया घरी वरचेवर जाऊन त्यांच्या बायाबापडयांना कामकाज, करमणूक, भजन, प्रार्थना इत्यादिकांच्या निमित्ताने आपल्या घरी बोलावून व एकंदरीत अशा रीतीने त्यांच्याशी मिळून मिसळून राहिले पाहिजे व मंडळीच्या ज्या निरनिराळया संस्था चालू आहेत त्याकडे त्या लोकांचे लक्ष वेधले पाहिजे; अशा प्रकारच्या एका आश्रमाची अत्यंत उणीव भासू लागली.  मंडळीच्या चालकांच्या मनात हे विचार येण्याच्या संधीस ईश्वरकृपेने त्यांची व एका उदार अंतःकरणाच्या सत्पुरुषाची अवचित गाठ पडून असा आश्रम निघत असेल तर आपण त्याच्या खर्चासाठी दरमहा शंकर रुपयांची नेमणूक करून देऊ, असे वचन देऊन १९०७ च्या फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी ही नेमणूक चालू केली !  व ता. २१ मे रोजी 'निराश्रित सेवासदन' ह्या नावाने हा आश्रम सुरू झाला.

हल्ली प्रार्थनासमाजातील दोन पुरुष व दोन स्त्रिया यांनी मंडळीचे काम अंगमेहनतीने करण्याचे पत्करिले आहे.


मंगळूर

दक्षिण कानडा जिल्ह्यात पारिया लोकांची स्थिती फारच दुःसह आहे.  मंगळूर ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी श्रीयुत के. रंगराव हे एकटेच ह्या गरीब लोकांसाठी गेली दहा वर्षे खपत आहेत.  सरकारापासून एक प्रशस्त जागा घेऊन त्यांनी आता येथे एक ऐसपैस पक्की इमारत बांधली आहे.  त्यांची अलीकडे बंद पडलेली शाळा फिरून तारीख ३ नोव्हेंबर १९०७ रोजी ह्या इमारतीत उघडण्यात आली.  हल्ली येथे पारियांची ५१ मुले शिकत आहेत.  पैकी ४ मुलांना दोन्ही वेळ जेवण घालून शाळेतच ठेवण्यात येते आणि २६ मुलांना दोन प्रहरी एक वेळ जेवण घालून रात्री घरी पाठविण्यात येते.  अशा व्यवस्थेशिवाय शाळा चालणेच शक्य नाही.  येथील ब्राह्मसमाजातील सुमारे बारा तरुणांनी एकत्र जमून एक 'तांदूळ फंड' स्थापन केला आहे.  दर रविवारी उपासनेनंतर ते घरोघर जाऊन एक एक मुष्ठीभर तांदूळ जमवितात.  तारीख २७ नोव्हेंबर १९०७ रोजी उद्योगशाळा उघडण्यात आली.  हल्ली तीत सहा माग चालू आहेत.  त्यांवर मुलांना विणकाम शिकविण्यात येते.  ह्या शाळेकरिता सध्या दोन हजार रुपयांची फार जरुरी आहे.  त्यासाठी पन्नास रुपयांचा एक असे चाळीस माग काढले आहेत, उदार गृहस्थांनी या कामी मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.


मंडळीच्या शाखा व संस्था

१.  मुंबई - ४ दिवसाच्या शाळा, विद्यार्थी ५००. १ वसतिगृह, विद्यार्थी २६. २ भजन समाज. १ उद्योगशाळा (सुतारी, शिवणकाम व बांधकामाचे शिक्षण )
२.  पुणे -  १ दिवसाची शाळा, विद्यार्थी २००.  १ भजनसमाज.  सुतारीचे व शिवणाचे वर्ग.  १ लायब्ररी इ.
३.  सातारा -  १ रात्रीची शाळा.  १ भजनसमाज.
४.  महाबळेश्वर - १ उद्योगशाळा (दोरखंड व नवार करणे)
५.  दापोली, ६. ठाणे व ७. मालवण - येथे गरीब विद्यार्थ्यांस मदत करणाऱ्या कमिटया.
८.  मंगळूर - १ दिवसाची व १ रात्रीची शाळा.  १ विणण्याचा कारखाना.  १ वसतिगृह.  १ साहत.
९.  मद्रास - २ दिवसाच्या व २ रात्रीच्या शाळा, विद्यार्थी १३०.
१०. हुबळी - १ दिवसाची, १ रात्रीची शाळा. १ वसतिगृह.
११. अकोला - ३ रात्रीच्या शाळा.  १ वसतिगृह.
१२.  अमरावती - २ रात्रीच्या शाळा.
१३.  भावनगर - १ दिवसाची शाळा.  १ दवाखाना.
१४.  इंदूर - १ रात्रीची शाळा.


एकूण १४ शाखांच्या २४ शाळा व ५ वसतिगृहे आहेत.  १२ इतर संस्था.  त्यांत ५५ शिक्षक व ११०० विद्यार्थी आहेत.  दरसाल मंडळीचा खर्च वीस हजार (२०,०००) रुपयांवर आहे.

येणेप्रमाणे आपल्या प्रांती ह्या हतभागी वर्गाच्या उन्नतीसंबंधाच्या प्रयत्नांची थोडक्यात हकीकत आहे.  ह्या वर्गाच्या अफाट संख्येच्या मानाने हे प्रयत्न सिंधूत बिंदूप्रमाणे फारच अल्प आहेत हे जरी खरे आहे, तथापि, ज्या महात्म्यांच्या उदार अंतःकरणात शुभ प्रेरणा होऊन ह्या अल्प प्रयत्नास सुरुवात झालेली आहे, त्यांच्या मंगल कामनेप्रमाणे त्यांनी आरंभिलेल्या प्रयत्नास काही कालाने विशाल स्वरूप प्राप्त होईल, अशी आम्ही आशा बाळगितो.

हल्ली मंडळीच्या कामाकरिता मुंबई आणि पुणे मुक्कामी इमारतीची फार नड भासत आहे.  निदान पश्चिम हिंदुस्थानातील निकृष्ट वर्गाच्या हिताकरिता मंडळीच्या मनात जे काही करावयाचे आहे, त्याच्या खर्चासाठी पैशाची फारच मोठी गरज आहे.

'ह्या नीच मानिलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःलाच वर आणीत आहो...' ह्या, ह्या संस्थेच्या संस्थापनेच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष न्यायमूर्ती सर चंदावरकर ह्यांनी सांगितलेल्या मंत्रवाक्याचा सतत जप करून प्रत्येक महाराष्ट्रीय धनी, निर्धन, स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, ब्राह्मण व शूद्र शक्तयनुसार ह्या हीनदीन लोकांच्या हितासाठी तनमनधनाने प्रयत्न करील, अशी आम्ही उमेद बाळगितो.

तो सत्य संकल्पाचा दाता भगवान आमची ही मंगल कामना पूर्ण करो !

भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची महाराष्ट्र परिषद सन १९९२

परिषद कमिटीच्या कामाचा रिपोर्ट

ज्या मंगलमय प्रभूच्या कृपेने भा. नि. सा. मंडळीची महाराष्ट्र परिषद शनिवार, रविवार व सोमवार ता. ५,६ व ७ ऑक्टोबर सन १९१२ या तिन्ही दिवशी निर्विघ्नपणे पार पडली, त्या प्रभूचे आरंभी नम्रभावाने स्तवन करून नंतर परिषदेच्या अहवालास सुरुवात करू.

कल्पनेचा उदय  :  नि.सा. मंडळीच्या पुणे शाखेच्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता रा. वि. रा. शिंदे हे ऑगस्ट महिन्यात पुणे येथे आले.  त्यानंतर त्यांच्या मनात पुणे शाखेच्याच हितचिंतकांची एक लहानशी परिषद अगदी अल्प प्रमाणात भ्रवावी, हे विचार घोळू लागले व यासंबंधी चर्चा करून रा. जव्हेरे, सत्तूर, सहस्त्रबुध्दे, पटवर्धन वगैरे मंडळींची एक लहानशी सभा भरून ज्या पद्धतीवर परिषदेचे काम चालावे असे ठरले, ती पद्धत आखली गेली.  पुढे विचारांती या संकुचित परिषदेची कल्पना राहून विस्तृत प्रमाणावर भारतीय नि. सा. मंडळीच्या महाराष्ट्रातील हितचिंतकांचीच एक परिषद भरवावी असे ठरले व त्याप्रमाणे परिषदेची कार्यकारी कमिटी ठरली.  या कमिटीच्या रचनेत एक विशेष आहे तो हाच की, हिच्यात सर्व अस्पृश्य जातीचे निवडक प्रतिनिधी तर घेतलेच, पण त्याखेरीज प्रो. भाटे, कानिटकर व सहस्त्रबुध्दे, रा. देसाई, सत्तूर व भातखंडे वगैरे मंडळी घेऊन पुण्यास जनतेकरिता खटपट करणाऱ्या संस्थांचेही त्यात प्रतिनिधी येतील, अशी व्यवस्था केली. इतकी व्यवस्था झाल्यानंतर या परिषद स्वगत कमिटीचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची डॉ. मॅनसाहेब यांना विनंती केली व ती त्यांनी नेहमीच्या सौजन्यास अनुसरून मान्य केली.  नंतर परिषद स्वागत मंडळीची पहिली बैठक ता. ७ सप्टेंबर रोजी भरली.  त्या वेळी परिषदेसंबंधी सर्व व्यवस्थेचे टाचण तयार झाले, व्यवस्थापकांत कामाची वाटणी झाली व कामास जोराने सुरुवात झाली.  या परिषदेकरिता बाहेरगावाहून निराश्रितांचे प्रतिनिधी, नि. सा. मंडळीच्या शाखांचे प्रतिनिधी व इतर हितचिंतक विद्वान वत्तेफ् यांना आमंत्रण करावयाचे ठरले व ती सर्व मंडळी येथे आल्यावर त्यांची उतरण्याची, राहण्याची, जेवण्याची वगैरे सर्व सोय करण्याचेही परिषद-कमिटीने पत्करिले.  अर्थात 'मूळातरभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' या न्यायाने पैशाची अडचण दत्त म्हणून पुढे उभी राहिली.  पण त्या बाबतीत शक्य ती खटपट करण्याचे काम प्रो. सहस्त्रबुध्दे व भाटे आणि रा. देसाई व शिंदे यांनी पत्करिले व प्रो. धर्मानंद कौसंबी, प्रो. घाटे, रा. हिवरगांवकर, रा. चिटणीस वकील, रा. नीलकंठराव सहस्त्रबुध्दे व भारत सेवक समाजाचे रा. आपटे यांनी फार श्रम घेऊन मदत केली.  त्याबद्दल या सदगृहस्थांचे आम्ही फार आभारी आहोत.

परिषदेकरिताप्रथम पाचशे रुपयांपर्यंत खर्च लागेल असा अंदाज होता, पण अखेरीला सोबत जोडलेल्या हिशेबांत दाखविल्याप्रमाणे खर्च झाला.

परिषदेस येण्याकरिता बाहेरगावच्या निवडक निराश्रित बंधूंना व इतर वरिष्ठ जातींच्या बंधूंनाही परिषद-कमिटीच्या सेक्रेटरींनी आमंत्रण केले व त्यांचापत्रव्यवहार परिषद भरेपर्यंत चालूच होता.  परिषदेकरिता जवळजवळ २००० पत्रे बाहेर पाठवून त्यांची उत्तरेही आली, व हे काम अवघ्या १-१॥ महिन्याच्या आत करावे लागले.  बाहेरगावांहून परिषदेसाठी येणाऱ्या मंडळींना कन्सेशन्स देण्याबद्दल निरनिराळया रेल्वे कंपन्या व बोटींच्या कंपन्या यांच्याशीही सेक्रेटरींनी पुनःपुनः पत्रव्यवहार केला; पण सर्वांकडून शेवटपर्यंत नाकारार्थीच जबाब आल्यामुळे बाहेरून येणाऱ्या बऱ्याचजणांची व परिषद-कमिटीचीदेखील फार निराशा झाली.  या परिषदेच्या बाबतीत खाली दिलेल्या विशेष गोष्टींची योजना केली होती.

१.  स्थानिक सभा :  परिषदेची कल्पना समजावून देण्यासाठी स्थानिक निराश्रितांच्या मोहल्यांत जाऊन भवानी पेठेत २, गंज पेठेत १, भांबुर्डा येथे २, कसबा पेठेत १, हडपसर येथे १ व वानवडी येथे १, अशा एकंदर आठ सभा भरविण्यात आल्या. या सर्व ठिकाणी जमलेल्या मंडळींना या सभेस निमंत्रण करण्यात आले व ह्यांपैकी बरीच मंडळी परिषदेस आली होती, ही मोठया आनंदाची गोष्ट आहे.

२. परिषदेकरिता स्वयंसेवकांची मंडळी :  या मंडळीची सभा ता. ४ ऑक्टोबर रोजी भरून त्यांत रा. शिंदे यांनी परिषदेचा उद्देश समजावून दिला व त्याप्रमाणे सोबत नावे दिलेल्या मंडळींनी स्वयंसेवकांचे काम परिषदेच्या तिन्ही दिवशी उत्तम तऱ्हेने पार पाडले याबद्दल परिषद कमिटी यांची फार आभारी आहे.  स्वयंसेवकांखेरीज सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सभासद रा. वझे यांनी तर परिषदेच्या कामाला रात्रंदिवस मदत केली व त्यांच्या प्रयत्नांनी परिषदेचे बरेच काम यशस्वी झाले, हे नमूद करण्यास आम्हांस फार आनंद वाटत आहे.  रा. वझे यांचे हातून अशीच देशसेवा व समाजसेवा होवो, असे आम्ही इच्छितो.

३.  पाहुण्यांची सोय  :  परिषदेकरिता आलेल्या सर्व पाहुण्यांच्या जेवण्याची सोय नि.सा. मंडळीच्या पुणे येथील लष्करांतील शाळेच्या इमारतीत केली होती. या इमारतीच्या पिछाडीस या पाहुण्यांच्या भोजनाकरिता एक प्रशस्त मंडप घातला होता.  या मंडपात शुक्रवार सायंकाळपासून सोमवार दुपारपर्यंत पाहुण्याची भोजने झाली.  पाहुणे सर्व मिळून सुमारे २५० होते.  स्वयंपाक करण्यास ब्राह्मण आचारी मिळाले होते, ही विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.  अशा रीतीने सर्व जातींच्या पाहुण्यांचे एकाच मंडपात भेदभाव न बाळगिता एकत्र भोजन होत होते.

४.  पाहुण्यांचे व इतर हितचिंतकांचे प्रीतिभोजन  :  परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी परिषदेचे स्वयंसेवक, वरिष्ठ ज्ञातींचे हितचिंतक व इतर पाहुणे मंडळी यांचे प्रीतिभोजन झाले.  भोजनप्रसंगी डॉ. मॅन यांनी स्वागतकमिटीचे अध्यक्ष म्हणून मुख्य यजमान या नात्याने पाहुणे मंडळींचा मोठया प्रेमाने समाचार घेतला व ते स्वतःही एतद्देशीय पद्धतीने बूट काढून सर्वांबरोबर जमिनीवर जेवावयास बसले.  या वेळेचा थाट व आनंद अवर्णनीय होता.  सर्व हिंदुस्थानात अशा आनंदाचे प्रसंग नेहमी केव्हा येतील ते येवोत, पण नि.सा. मंडळीच्या परिषदेच्या वेळी तरी हा प्रसंग आला याबद्दल परिषद-कमिटीला धनयता वाटत आहे.  भोजनास सुमारे ४०० मंडळी होती.  त्यांपैकी निदान ५० तरी निरनिराळया वरिष्ठ जातींची होती.

५.  परिषदेस आलेल्या प्रतिनिधींची व पाहुण्यांची विशेष माहिती  :  परिषदेकरिता निरनिराळया जिल्ह्यांतून व निरनिराळया गावांतून सर्व जातींचे पाहुणे आले होते.  या सर्व पाहुण्यांची जातवारी व स्थलवारी दाखविणारे कोष्टक सोबत जोडलेले आहेच.  या पाहुण्यांत उमरावती व अकोला वगैरेसारख्या लांबच्या पल्ल्यावरून रा. भांगले व रा. परचुरे व भावनगरहून रा. वैद्य यांनी सहकुटुंब येऊन आपल्या निराश्रित बंधूंना वर घेण्याचा जो उत्साह दाखविला त्याबद्दल; अहमदनगर, बेळगांव, सातारा, मुंबई वगैरे ठिकाणांहून आमच्या निराश्रित बंधूंनी कळकळ दाखवून त्यांच्या उन्नतीकरिता चाललेल्या या मुंडळीच्या प्रयत्नांना उत्तेजन देण्याकरिता ते येथे आले त्याबद्दल; नाशिक, कोल्हापूर, पंढरपूर, मुंबई वगैरे ठिकाणांहून जी थोर थोर वरिष्ठ जातींची मंडळी येथे आली त्याबद्दल; त्या सर्वांचे परिषदकमिटी अंतःकरणपूर्वक आभार मानीत आहे.  कित्येक ठिकाणच्या आमच्या अस्पृश्य बंधूंना रेल्वेकडून कन्सेशन न मिळाल्यामुळे, पैशाच्या अडचणीमुळे व वरिष्ठांकडून रजा न मिळाल्यामुळे निराश होऊन येता आले नाही, हे आम्ही जाणून आहोत.  परंतु त्यांनी परिषदेच्या कामाबद्दल जी सहानुभूती व प्रेम दाखविले त्याबद्दल त्यांची परिषद-कमिटी ॠणीच राहील.  विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, उमरावतीहून मिसेस भांगले, अकोल्याहून श्री. व सौ. इंदिराबाई परचुरे, श्रीमती बेंद्राबाई; मुंबईहून श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे व श्री. सौ. जनाबई शिंदे, भावनगरहून श्री सौ. चंपूताई वैद्य व सातारा, मिरज वगैरे ठिकाणांहून इतर अस्पृश्य भगिनींनी या परिषदेकरिता येऊन जी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. या सर्व बाहेरगावाहून आलेल्या भगिनींनी श्री. सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांनी व मिसेस कांबळे, थोरात, सदाफळे वगैरे अस्पृश्य भगिनींनीही येऊन जी मदत केली; त्यामुळेच सर्व सामानासुमानाची नीट व्यवस्था लागली.  या सर्व मदतीबद्दल वरील भगिनींचे आम्ही फार आभारी आहोत.

६.  पाहुण्यांची दिनचर्या  :  सर्व पाहुणे मंडळी येथे आल्यावर त्यांच्या नावांची नोंद होई, नंतर त्यांची सर्व प्रातःकालची कृत्ये वगैरे आटोपल्यानंतर त्यांना चहा देण्यात येई, नंतर त्यांची व इतर मंडळींची ओळखदेख होऊन बोलणेचालणे होई व नंतर मोठया प्रेमाने भेजने होत.  सर्व दिवसाचा कार्यक्रम ठरलेला असे, त्याप्रमाणे नियमितपणे सर्व कामे होत.  दर दिवसाच्या कार्यक्रमाला भजनाने व उपासनेने सुरुवात होई.  पहिल्या दिवसाची उपासना येथील वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध नागरिक रा. ब. काशिनाथ बाळकृष्ण मराठे यांनी चालविली.  दुसऱ्या दिवसाची उपासना, पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या बुधवारातील श्रीहरिमंदिरात परिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर यांनी चालविली.  त्या वेळी परिषदेची सुमारे २५० मंडळी समाजाच्या बुधवारांतील श्रीहरिमंदिरात जमली होती.  तिसऱ्या दिवशी सकाळी रा. शिंदे ह्यांनी शाळेत उपासना चालविली.  त्या वेळी परळ बोर्डिंगातील मुलांनी निरनिराळया व्यक्ति-प्रार्थना केल्या.

७.  स्त्रियांची सभा :  परिषदेच्या कामाची पुण्यातील निराश्रित वर्गातील स्त्रियांना व त्यांच्या वरिष्ठ वर्गातील हितचिंतक भगिनींना माहिती करून देण्याकरिता मंडळीच्या लष्करातील शाळेत सोमवार ता.७ ऑक्टोबर १९१२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्त्रियांची सभा भरली होती.  या सभेस पुण्यातील फीमेल ट्रेनिंग कॉलेजांतील विद्यार्थिनी, सेवासदनातील श्री. सौ. सीताबाई भाण्डारकर, श्री. सौ. काशीबाई कानिटकर वगैरे पुष्कळ सभासद, मुंबईच्या श्री. सौ. लक्ष्मीबाई रानउे, अकोल्याच्या श्री. सौ. इंदिराबाई परचुरे व श्रीमती बेंद्राबाई, मिसेस हारकर व लष्करातील बऱ्याच अस्पृश्य भगिनी मिळून सुमारे ३०० स्त्रिया या सभेस हजर होत्या.  या सभेचे अध्यक्षस्थान श्री. रमाबाईसाहेब रानडे यांनी स्वीकारले होते.  प्रास्ताविक भाषणे श्री. जनाबाई शिंदे व त्यांचे बंधु रा. शिंदे यांची झाल्यानंतर, श्रीमती रमाबाईसाहेब यांचे फार मुद्देसूद भाषण झाले.  त्यानंतर श्री. सौ. इंदिराबाई परचुरे, श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे, मिसेस हारकर व अस्पृश्य भगिनींपैकी सौ. पार्वतीबाई जाधव यांची भाषणे झाली.  या सभेच्या प्रसंगी मुलांची स्वागतपर गाणी व ड्रिल प्रेक्षणीय झाली.

८.  परिषदेत झालेली वक्तयांची भाषणे  :  या परिषदेत तिन्ही दिवशी मिळून बऱ्याच वक्तयांची भाषणे झाली.  त्यात अध्यक्ष डॉ. भाण्डारकर, नामदार सरकार बाबासाहेब इचलकरंजीकर, नामदार मौलवी रफिउद्दीन अहमद, रा. देवधर, रा. नरसोपंत केळकर, धारवाडचे श्रीमत महाभागवत, रा. लक्ष्मणशास्त्री लेले, रा. जाधवराव, प्रो. भाटे, कानिटकर व लिमये व अस्पृश्यवर्गापैकी रा. गवई, कांबळे, सुभेदार, मेजर भाटणकर, डांगळे, रखमाजी कांबळे, संतूजी वाघमारे, साताऱ्याचे रा. श्रीपतराव नांदणे व पुण्याचे रा. नाथामहाराज वगैरे मंडळींची भाषणे फार मुद्देसूद व विचारणीय झाली.  अध्यक्षांच्या भाषणातील विचारणीय माहिती व अस्पृश्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांची कळकळ खरोखर अवर्णनीय आहे.  श्रीमंत इचलकरंजीकर यांच्यासारख्या संस्थानिकाने निराश्रित साहाय्यकारी मंडळीने चालविलेल्या शिक्षणविषयक कामाला सहानुभूती दाखवावी, मंडळीला प्रेमाच्या शब्दांनी उत्तेजन द्यावे, अस्पृश्यांना प्रथम कडू वाटणारा पण परिणामी हितकर होणारा उपदेश करावा, या गोष्टीने मंडळीच्या चालकांना आपल्या कामात जय मिळविण्याची फार उमेद वाटत आहे.  श्रीमंत महाभागवत, रा. लक्ष्मणशास्त्री लेले व नरसोपंत केळकर यांची भाषणे फारच उदारतादर्शक झाली.  त्यांच्यासारख्या जुन्या हिंदुधर्माभिमानी गृहस्थांनी पुढाकार घेऊन नि. सा. मंडळीला आपल्याकडून शक्य ती मदत करण्याची अशीच तजवीज केली, तर मंडळीवर हे त्यांचे महदुपकार होतील.  वरील सर्व वक्तयांच्या मदतीनेच परिषद यशस्वी झाली.  डॉ. भाण्डारकर यांनी उतारवयात कामाचा पुष्कळ बोजा शिरावर असता, अध्यक्षस्थान स्वीकारून परिषदेच्या कार्याला जी बिनमोल मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार शब्दांनी मानणे फार कठीण आहे.  इतर सर्व वत्तेफ्, परिषदेचे प्रतिनिधी व हितचिंतक व फर्ग्युसन कॉलेजची सर्व मंडळी यांचे आभार मानणे आमच्या शक्तीबाहेर आहे.  कारण त्या सर्वांनी जी मदत केली व परिषदेचे जे काम आपले म्हणून अंगावर घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार किती मानावे !

९.  परिषदेच्या कामाकरिता मिळालेली मदत  :  परिषदेच्या फंडाला रोख रक्कम रुपये मिळाली व वटखर्च रुपये ..... झाला यावरून ...... रुपयांची तूट आलेली आहे; ही तूट भरून काढण्यास मदत करण्यास उदार देशबंधूंना परिषद-कमिटीची विनंती आहे.  परिषदेच्या कामाकरिता रोकड रक्कम ज्यांनी दिली त्यांची तर परिषद-कमिटी आभारी आहेच.  त्याखेरीज वानवडीचे अस्पृश्यवर्गातलेच काँट्रॅक्टर रा. शिवराम कृष्णाजी कांबळे यांनी व त्यांच्या मुलांनी मांडव घालण्याच्या कामी स्वतःचे सामान पुरवून रात्रंदिवस केलेल्या अंगमेहनतीबद्दल, रा. मांडगावकर यांनी मांडवाच्या छताकरिता कापडाचे सुमारे ६० रु.चे ८ तागे पाठविल्याबद्दल, रा. गौडसाहेब यांनी खर्ुच्या, तंबू वगैरे सामान मिळवून देण्याकरिता केलेल्या खटपटीबद्दल, रा. मार्गन बाळमृष्ण, मेहता मंपनी, एच. ओ. अब्दुल रहिमान, मेसर्स मेरवानजी मेस काँट्रॅक्टर, रा. मारुतीराव व कांबळे, मेसर्स गोखले, टोकेकर व कंपनी व श्री. सीतारामपंत जव्हेरे यांनी खर्ुच्या, तंबू, ताडपत्र्या व इतर सामान दिल्याबद्दल, डॉ. रानडे, रा. शिवराम कृष्णाजी कांबळे, रा. शिवराम जानबा कांबळे, रा. थोरात, रा. ढवळे वगैरे मंडळींनी भांडी वगैरे दिल्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत.  त्याखेरीज रा. काशीनाथ विष्णु दामले यांनी टाइपरायटर देऊन व सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने आपला सायक्लोस्टाइल प्रेस देऊन परिषदेच्या कामाला फार मदत केली.  आर्यभूषण छापखान्याच्या व्यवस्थापकांनी परिषदेची सर्व कामे फार थोडया वेळात सुबक व सुंदर छापून दिली.  या मदतीबद्दल आम्ही वरील सर्व मंडळींचे ॠणी आहोत.

१०.  परिषदेत बोर्डिंगास मिळालेली मदत  :  परिषदेच्या प्रसंगी ता. ५ रोजी नि.सा. मंडळीच्या पुणे शाखेच्या निघणाऱ्या बोर्डिंगाकरिता मदत मागण्यासाठी जी भिक्षापात्रे सभासदांत फिरविण्यात आली; त्यात वरिष्ठ वर्गीयांच्या बरोबरीने अस्पृश्य बंधूनीही शक्तयनुसार भिक्षा घालून मदत केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे.  आपल्याचकरिता निघणाऱ्या व चालणाऱ्या संस्थांना अशीच सक्रिय सहानुभूती अस्पृश्य बंधूंनी नेहमी वाढत्या प्रमाणात दाखवावी अशी आमची त्यांस विनंती आहे.  या बोर्डिंगच्या मदतीकरिता परिषदेत रोख ८० रुपये व १२५ रुपयांची वचने मिळून अंदाजे २०० रुपये जमा झाले.  बोर्डिंगकरिता सुरुवातीला २००० रुपयांची जरुरी आहे हे लक्षात घेऊन नि. सा. मंडळीच्या सर्व हितचिंतकांनी या कार्याला मदत करावी अशी त्यांस आमची नम्र विनंती आहे.

११.  परिषदेतील गायनाचा कार्यक्रम  :  या परिषदेत नि. सा. मंडळींच्या पुणे शाखेच्या शाळेतील मुलांनी स्वागतपर गाणी म्हटली व ड्रिल करून दाखविले.  त्याचा प्रेक्षकांवर फार चांगला परिणाम झाला.  वरील पद्ये व ड्रिल वगैरे कामे थोडक्या दिवसांच्या अवधीत मुलांना शिकण्याचे व शिकविण्याचेही फार श्रम पडले.  पण मुलांनी हुरूपाने जी आपली कामगिरी बजाविली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.  त्याचप्रमाणे पुणे शाखेच्या शिक्षकमंडळींनी परिषदेकरिता स्वयंसेवकांप्रमाणे उत्साहाने व प्रेमाने जी कामे बजाविली व परिषदेच्या कार्याला मदत केली त्याबद्दल त्या सर्वांचे परिषद-कमिटीतर्फे आम्ही आभार मानितो.

१२.  मुंबईच्या बोर्डिंगचे विद्यार्थी :  मुंबईच्या निराश्रित सा. मंडळीच्या परळ येथील बोर्डिंगातील वीस विद्यार्थी बरोबर घेऊन परिषदेत स्वयंसेवकांचे कामाकरिता बोर्डिंगचे सुपरिंटेंडंट स्वतः आले होते.  त्या विद्यार्थ्यांच्या आचार, विचार व राहणीवर बोर्डिंगात राहून किती सुपरिणाम झाला आहे; हेही येथे परिषदेकरिता जमलेल्या अस्पृश्यवर्गातील व वरिष्ठ वर्गातील पाहुण्यांना पहावयास सापडले. या मुलांनीही परिषदेच्या कामास फार व्यवस्थितपणे मदत केली.  या मदतीबद्दल परळ बोर्डिंगचे सुपरिंटेंडंट रा. वामनराव सोहोनी व त्यांचे विद्यार्थी यांचे आम्ही फार आभारी आहोत.

शेवटी ज्या जगन्नियंत्याच्या कृपेने ही परिषद यशस्वी होऊन पार पडली, त्याची अशीच कृपादृष्टी सदैव निराश्रित साह्यकारी मंडळीवर राहो व मंडळीच्या हातून नेहमी त्याला आवडतील अशीच सत्कृत्ये घडोत, अशी त्याची नम्र प्रार्थना करून हा लांबलेला रिपोर्ट पुरा करितो.

वि. रा. शिंदे
दा. ना. पटवर्धन,
सेक्रेटरीज्
नि. सा. मंडळीची शाळा,
लष्कर-पुणे
ता. २५ नोव्हेंबर सन १९१२

भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची महाराष्ट्र परिषद तिसरा दिवस

दिवस तिसरा

स्त्रियांची सभा

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेला जोडून स्त्रियांची एक सभा मंडळीच्या लष्करातील शाळेच्या भव्य दिवाणखान्यात भरली होती.  या सभेची निमंत्रणपत्रिका श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे व श्री. सौ. सीताबाई भांडारकर यांच्या नावची होती.  या सभेस पुण्याचे सेवासदन, फीमेल ट्रेनिंग कॉलेज व हायस्कूल यांमधील आणि लष्करातील उच्च वर्णांतील सुमारे ५० व अस्पृश्यवर्गांतील २५० पर्यंत स्त्रिया हजर होत्या.  सभेचे अध्यक्षस्थान श्री. रमाबाईसाहेब रानडे यांनी सुशोभित केले होते.  जमलेल्या स्त्रियांत मिसेस हारकर, श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे, श्री. सौ. सीताबाई भांडारकर, श्री. सौ. काशीबाई कानिटकर, श्री. सौ. जनाबाई शिंदे व श्री. सौ. रुक्मिणीबाई शिंदे वगैरे मंडळी होती.  आरंभी श्री. सौ. जनाबाई शिंदे यांनी जमलेल्या स्त्रियांचे स्वागत करून त्यांना नि. सा. मं.ची माहिती करून दिली.  नंतर त्यांचे बंधु रा. विठ्ठलराव शिंदे यांनी अध्यक्ष श्री. रमाबाईसाहेब रानडे व श्री. सौ. काशीबाई कानिटकर यांची श्रोतृवर्गास ओळख करून दिली.  नंतर अध्यक्ष श्री. रमाबाईसाहेब यांचे भाषण झाले.  त्या म्हणाल्या :  रा. शिंदे यांनी सन्मानपर विशेषणांचा पाऊस पाडून माझा जो गौरव केला आहे, तो सर्वथा अवास्तव असला तरी त्यायोगे त्यांच्या अंतःकरणाचा थोरपणा व्यक्त होत आहे.  अशी प्रस्तावना करून त्या म्हणाल्या :  निकृष्ट वर्गातील स्त्रियांची सभा भरवून त्यापासून निष्पन्न ते काय होणार ?  सभा भरविण्यास श्रोतृवर्ग सुबुद्ध व विचारक्षम असला पाहिजे.  हीन जातींतील अडाणी बायकांना असे एकत्र आणण्यापासून फायदा काय ?  अशी कोणास या सभेच्या उपयुक्ततेसंबंधाने शंका येईल, परंतु अशांनी सभेत होणाऱ्या सर्व गोष्टींची चर्चा प्रथम सर्वांना समजू लागेल हे ध्यानात आणले पाहिजे.  पुराणांतील कथाभाग पाहिल्या वाचनानेच नीट आपल्या मनात उतरला नाही तरी तसेच वाचीत राहिल्याने निव्वळ पाठांतरानेच पुढे त्याचा सर्व उलगडा होतो व आपल्या अंतःकरणात दिव्य ज्ञान उत्पन्न होते, अशी आपणामध्ये समजूत आहे.  तसाच प्रकार या सभेचा आहे.  सभा भरविणे हे आपल्या बायकांना अपरिचित असल्याने आरंभी त्यांपासून तितका फायदा झाल्याचे दिसून येत नाही.  परंतु तेच त्यांच्या अंगवळणी पडल्यानंतर या सभांपासून त्यांस पुरतेपाणी फायदा होऊ लागेल.

आपण अज्ञानी आहोत व ज्ञानसंपादनाच्या मार्गास आपणास लागले पाहिजे अशी इच्छा आम्हा स्त्रियांमध्ये अद्याप उत्पन्न झालेली नाही, व म्हणून आम्हांमध्ये त्या दिशेने काही हालचालही सुरू झालेली नाही.  स्त्रियांना हल्लीच्या अज्ञानावस्थेत इतउत्तर ठेवता कामा नये, त्यांना विद्यादान करावे यासंबंधाने जी काही आस्था दिसत आहे ती पुरुषवर्गामध्ये दिसत आहे.  बायकांना पुरुष एवढी चिंता व एवढी उठाठेव का करतात, हेच समजत नाही.  कारण हल्लीची आपली स्थिती कोणत्याही प्रकारे अनिष्ट व आपणास कमीपणा आणणारी आहे असे त्यांस वाटतच नाही आणि म्हणून त्याने त्या असुखीही होत नाहीत.  आपल्या वास्तविक दुर्दशेची ज्याला जाणीव होईल तो प्रयत्न करून स्वतःस उन्नतीप्रत नेईल, किंवा ते न साधले तर आपल्या दुरवस्थेबद्दल तळमळ लागून तो असुखी तरी होईल. परंतु आम्हांमध्ये ही जाणीव नाही म्हणून ती तळमळही नाही.  आम्ही आमच्या सध्यांच्या हीन परिस्थितीतही इतक्या रंगून गेलो आहो की, तिजमध्ये काही सुधारणा केली पाहिजे असे आम्हांस वाटतच नाही.  उलट दुसऱ्या कोणी सुधारणेचा यत्न केल्यास ती आम्हांस रिकामी पंचाईतशी वाटते.  वाईट परिस्थितीही अभ्यासाने बरी वाटू लागते, एवढेच नव्हे तर तिचाच अधिक हव्यास उत्पन्न होतो.  ही गोष्ट आपणा सर्वांच्या अनुभवातील आहे.  पुराणात अशी एक कथा सांगितली आहे की, एका योग्याला काही दोषामुळे 'पुढील जन्मी तू डुकराच्या जन्मास जाशील' असा शाप झाला.  आणि त्यायोगे तो चिंतामग्न झाला, आणि त्याने आपल्या शिष्यास सांगून ठेविले की, 'पुढील जन्मी मी डुकराच्या जन्मास जाशील' असा शाप झाला.  आणि त्यायोगे तो चिंतामग्न झाला, आणि त्याने आपल्या शिष्यास सांगून ठेविले की, 'पुढील जन्मी मी डुकराच्या योनीत जन्मेन, तेव्हा माण्या कपाळावर एक पांढारा टिळा असेल.  तो पहाताच तो माझा अवतार असे समजून तू मला मारून टाक म्हणजे त्या हीन स्थितीत राहून दुष्कर्मे आचरण्याचा प्रसंग मजवर न येता मला एकदम मुक्ती मिळेल.'  शिष्याला त्या वर्णनाचा एक डुक्कर आढळला, तेव्हा तो त्यास मारू लागला तेव्हा त्या डुकराने त्याचा निषेध केला.  त्यावर त्या शिष्याने विचारले, 'गुरुजी, तुम्हीच मला मारण्याची आज्ञा केली होती, मग आता असे का ?'  तेव्हा गुरुजी म्हणाले, 'त्या वेळी ही डुकराची अवस्था मला हीन असे वाटत असे, म्हणून मी तुला तसे सांगितले, परंतु आता हीच स्थिति मला आवडू लागली आहे, ती नष्ट होईल तरच मला दुःख होईल.'  तशीच स्थिति आमची झाली आहे.  आपली स्थिति वाईट असे वाटते कोणास ?  जे स्वतः उच्च स्थितीत; जातीने नव्हे, तर ज्ञानाने आहेत त्यांना.  पुरुषवर्गाला हे ज्ञान आहे म्हणूनच आमच्या अज्ञानाची त्यांना कीव येते व ते दूर करण्याचा ते यत्न करतात.  निराश्रितवर्गांतील स्त्रियांची सुधारणा करण्यसंबंधाने पुणे, मुंबई, यवतमाळ, अकोले, अमरावती वगैरे ठिकाणी जे प्रयत्न होत आहेत ते मी सर्व पाहिले आहेत.  श्रीमती बेंद्राबाई यांनी आपल्या जातीतील १४-१५ मुलांचे एक स्वतंत्र बोर्डिंग चालविले आहे, त्याचा विशेष निर्देश करावयास हवा.  या बोर्डिंगात इतकी स्वच्छता, टापटीप वगैरे दिसून येते की, त्यांत राहणारी मुले निकृष्ट जातीची आहेत असे कोणासही सहज ओळखता येत नाही.

शिक्षणाप्रमाणेच स्वच्छतेकडे आमच्या निराश्रितवर्गाच्या लोकांनी लक्ष पुरविले पाहिजे.  या लोकांच्या मार्गांत अस्पृश्यतेची जी मुख्य अडचण आहे, ती माझ्या मते स्वच्छपणाच्या सवयीमुळे दूर होईल.  कारण स्पर्श केल्याने विटाळ होतो ही जी समजूत आहे, ती या वर्गाची रहाणी अस्वच्छतेची, त्याचा धंदा अस्वच्छतेचा, त्यांचे राहणे गावाबाहेर या गोष्टीवरून झाली असावी.  पुढे स्वच्छतेला अधिकाधिक किंमत मिळून स्वच्छता म्हणजे सोवळेपणा-शूचिर्भूतपणा असे समजून सामान्य जनसमूहाने अशा अस्वच्छ मनुष्यांना व्यवहारापासून बहिष्कृत केले असावे.  हे जर खरे असेल तर अस्पृश्यतेचा दोष काढून टाकण्याचा उपाय ज्या मार्गाने ही अस्पृश्यता आली त्याच मार्गाने तिला घालविली पाहिजे हा होय, हे उघड आहे.  अस्वच्छ म्हणजे अमंगळ असे ज्या न्यायाने लोक समजतात, त्याच न्यायाने स्वच्छ म्हणजे शुचिर्भूत असे ते समजू लागतील व त्यांना व्यवहार्य लेखतील अशी माझी समजूत आहे.  अस्पृश्यतेची वरील मीमासा खरी असो वा नसो, स्वच्छतेच्या सवयी आपणास लावून घेण्याबद्दल निराश्रित लोकांची खटपट पाहिजे व तसे झाल्यास उच्च जातींच्या वर्गात ते सहज मिसळू शकतील यात मला किंचितही शंका वाटत नाही.  शेवटी उच्च वर्गाच्या लोकांना निराश्रितांस अंतःकरणपूर्वक साहाय्य करण्याचा उपदेश करून अध्यक्षांनी आपले भाषण संपविले.

यानंतर सौ. पार्वतीबाई जाधव यांचे भाषण झाले.  या बाई महार जातीच्या असून मिरज येथील राहणाऱ्या आहेत.  बाईंचे माहेर पुणे जिल्ह्यात सासवड येथे आहे.  परिषदेत भाषण करताना त्या म्हणाल्या :

प्रिय भगिनींनो, आज आपल्या भेटीचा जो प्रसंग आला आहे तो मला तरी खरोखर अपूर्व असा वाटतो.  या कॉन्फरन्सला येण्याबद्दल जेव्हा मला परवानगी मिळाली तेव्हा मला जो हर्ष झाला तो मीच जाणे.  पहिल्याने आपण कोठे उतरावे, वगैरेसंबंधी बरीच चिंता वाटत होती.  परंतु येथे पाहुण्यांकरिता सध्याचा जो कँप आहे तेथे गेल्यावर आमची ही काळजी अजीबात दरू झाली.  कँपमध्ये पोहचल्यावर पाचसहा मिनिटांतच तिघी-चौघी बाया मजजवळ आल्या आणि जेथे बसणे, उठणे मला फार सोईचे वाटले अशाच जागी माझी उतरण्याची सोय झाली.  माझ्यासारख्या ज्या थोडया बाया येथे आल्या होत्या, त्यांना येथील बायांनी कोणत्याच प्रकारची अडचण पडू दिली नाही.  उलट त्या आमच्याशी जरा मनमोकळेपणाने आणि प्रेमाने वागल्या त्याची फेड लाजून लाजूनच पुरे होण्यापलीकडे आमच्या हातून काही झाली नाही.  त्यांच्या त्या प्रेमळ स्वभावाचे मला वारंवार स्मरण होऊन या कॉन्फरन्सचा प्रसंग मी कधी विसरणार नाही.  बरे, असो.  गेल्या दोन दिवसांत जे काम झाले त्यासंबंधी मला विशेष ते काय समजणार ?  परंतु आमच्या उतरण्याच्या कँपमध्ये जो प्रकार दृष्टीस पडला तो पाहून माझी मती अगदी गुंग होऊन गेली.  तेथे बहुतेक सर्वच जातींचे लोक जमले होते.  त्यांमध्ये, महार, मांग, चांभार, ब्राह्मण यांपैकीच बहुतेक सर्वजण होते.  पुणे शहर पाहून त्या सर्वांना फार आनंद झालेला दिसत होता.  परंतु कोठे कोठे काही वादही होत असलेले आढळून आले.  कित्येक अशी शंका काढू लागले की, आता आपल्या सर्व जातींचे जेवण एका ठिकाणीच होणार की काय ?  त्यावर त्यांना अशी समज मिळाली की जातिवार पंक्ती बसविण्यात येतील आणि ज्यांची खुषी असेल त्यांनी सर्व जातींची एक पंगत होईल तीमध्ये जावे.  आलेल्या पाहुण्यांपैकीं काहीजण एका पंक्तीस बसण्यास तयार नव्हते.  यावर 'तुम्हांस ब्राह्मणांच्या पंक्तीत बसण्याची हौस वाटते, आणि मांगास पंक्तीत येऊ देण्यासंबंधाने तुम्ही नाराज होता' वगैरे वगैरे कांही वाद होऊन शेवटी सर्वजण काहीएक संकोच न बाळगिता एकाच पंक्तीत बसले.  ही गोष्ट मोठी आश्चर्यकारक झाली असे मला तरी निदान वाटते.  त्यांना तसे करण्यास कोणी आग्रह किंवा जुलूम केला नव्हता.  परंतु ब्राह्मण महारास जितके अस्पृश्य मानतात, तितकेच महार लोक मांगास अस्पृश्य मानीत असूनही आज निरनिराळया ठिकाणचे निदान तीनशे बहुतेक महार आणि मांग, एका ठिकाणी जेवलेले पाहून मला वाटते कोणासही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.  या सभेत मला जे काही विशेष समजले, ते हेच स्पष्ट रीतीने समजले, आणि मला वाटू लागले की, आमचे महार आणि मांग यापुढे जर असेच निश्चय करून धैर्याने वागतील तर आमच्या पंक्तीमध्ये वरिष्ठ वर्गाचा जो कमी भरणा दिसतो, तोही खरोखर वाढल्याशिवाय राहणार नाही.  आमच्या लोकांस ज्ञान देऊन त्यांच्यावर होत असलेला जुलूम नाहीसा करावा म्हणून जी ही खटपट होत आहे तिला ईश्वर यश देवो, अशी माझी त्याच्याजवळ फार फार प्रार्थना आहे.

यानंतर जमलेल्या स्त्रियांना उद्देशून मिसेस हारकर यांनी हिंदीत उपदेशपर दोन शब्द सांगितले.

नंतर मिस् शिंगणे व अस्पृश्यवर्गाचे पुणे येथील पुढारी रा. श्रीपतराव थोरात यांची कन्या सौ. लक्ष्मीबाई यांचे निबंधवाचन झाले.  नंतर सौ. इंदिराबाई परचुरे यांचे भाषण झाल्यावर मुंबईच्या श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे यांनी अध्यक्षांचे आभार मानिल्यावर परिषदेचे काम संपले.  या सभेच्या प्रसंगी नि.सा. मंडळीच्या पुणे येथील शाळेतील मुलांची स्वागतपर गीते व संगीत कवाईत प्रेक्षणीय झाली.

  1. ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग
  2. बौद्ध कालांतील अस्पृश्यता
  3. बहिष्कृत भारत
  4. प्रस्तावना
  • 128
  • 129
  • 130
  • 131
  • 132
  • 133
  • 134
  • 135
  • 136
  • 137
Page 133 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी