प्रकरण सातवे : संख्या आणि लक्षणें

अखिल हिंदुस्थानांत म्हणजे ब्रिटिशांच्या व एतद्देशीय संस्थानांच्या अमलाखाली असलेल्या प्रांतांत आणि शिवाय ब्रिटिश साम्राज्याखाली आलेल्या सरहद्दीवरील देशांत अस्पृश्य गणलेल्या मोठ्या जनसमूहात किती भिन्न भिन्न जातींचा समावेश होतो आणि त्या प्रत्येकाची संख्या किती आहे. तसेंच ह्या अनेक जातींचे किती मूख्य लक्षणांची पुन: वर्गीकरण होऊ शकतें ह्या गोष्टी ह्या प्रकरणांत पाहावयाच्या आहेत.


ह्या अफाट देशावर ब्रिटिशांचे आधिराज्य झाल्यावर येथील एक दर जनतेची पहिली शिरगणती इ. स. १८६७ ते ७२ च्या दरम्यान झाली. पण त्या वेळी कित्येक मोठ्या संस्थानांतील जनतेची गणती झाली नाही. पुढे दोन दशकांनी म्हणजे इ.स. १८८१ आणि १८९१ सालीं अधिक अधिक पूर्णत्वाने खानेसुमा-या झाल्या. पण आधुनिक समाजशास्त्राच्या दृष्टीने सर्वांगपूर्ण अशी खानेसुमारी इ.स. १९०१ सालच्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेच्या रात्रीं झाली. ह्या गणनासत्राचे मुख्य अध्यर्यु एच्. एच्. गिस्ले आणि त्यांचे साथीदार इ. ए. गेट हे होते. ह्यांच्या बहुमोल रिपोर्टाची अखिल हिंदी साम्राज्याचीं आणि प्रांतवार अजस्त्र पुस्तकें इ. स. १९०३ सालीं प्रसिद्ध झालीं. ह्याच वर्षी मी माझा विलायतेंतील ऑक्सफर्ड विद्यालयांतील तौलनिक धर्म आणि समाजशास्त्राचा अभ्यास आटपून स्वदेशी परत आलों. ब्राह्म समाजाचा प्रचारक म्हणून पुढील कित्येक वर्षे हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांत फिरण्याचा मला सुयोग घडला. तेव्हा अखिल भारतांतील मानीव अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याकरिता सुसंघटित प्रयत्न करणारी एक अखिल भारतीय मंडळी स्थापण्याचा मी संकल्प केला. त्याची तयारी म्हणून प्रथम मला ह्या खंडवजा देशांत ह्या मानीव अस्पृश्यांची संख्या किती आहे, हें नक्की ठरविणें अवश्य वाटलें. ह्या रिपोर्टात शोधून पाहतां अस्पृश्यांचे जातवार आणि प्रांतवार जे आकडे मिळाले, ते एकत्र करितां एकूण ५,३२,३६,३६२ हा अवाढव्य आकडा तयार झालेला पाहून मी स्वत:च आश्चर्यांने थक्क झालों. पुन: पुन: तपासून पाहिेलें तरी हा आकडा बळकटच झाला. शेवटीं तो मी इंग्रजी दैनिकांतून आणि मराठी मासिकांतून, शिवाय स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. तोंवर अस्पृश्यांची संख्या खरोखर एवढी मोठी असेल अशी कोणाची कल्पनाच नव्हती. आश्चर्य सर्वांनाच वाटलें. पुष्कळांनी कुरकूर केली. पण सांगोपांग विचार करुन हा आकडा कमी आहे असें कोणीच सिद्ध करावयाचा पुढे आलें नाही. सन १९०१ ह्या वर्षी अखिल भारताची जनसंख्या २९,४३,६१,०५६ होती. तिच्यापैकी ५ कोटीहूनही जास्तवरील संख्या अस्पृश्यांची ठरली. त्यामुळें एक षष्ठांश भारत अस्पृश्य हें एक पुढे ब्रीदवाक्यच बनून राहिलें ! त्याला अद्यापि बाधा आलेली नाही.


त्यानंतर आजवर तीन दशवार्षिक खानेसुमा-या झाल्या; तरी प्रस्तुत लेखाकरिता मला स. १९०१ सालच्या खानेसुमारीचा हवाला ध्यावा लागत आहे. ह्यांची कारणें अशी. हिंदी-विशेषत: हिंदू-समाजाचे लौकिक दृष्टया जे दर्जे ठरविण्यांत आले आणि त्या दृष्टीने भिन्न वर्गांचे एकूण आकडे प्रसिद्ध झाले ते ह्याच १९०१ सालीं. ह्या पद्धतीचा स्वीकार मागील दशकांत झाला नव्हताच, पण पुढील दशकांतही झाला नाही हें आश्चर्य ! दुस-या कित्येक दृष्टीने दर्जे ठरविण्याची ही पद्धत अप्रिय, अनिष्ट व कांही प्रांती तर अशक्य ठरली होती, तरी, ही योजना (Social Grouping) रिस्ले साहेबांनी इतकी मेहेनत घेऊन व विरोध सोसून तयार केली नसती व तिला अनुसरून प्रांतवार आकडे मागवून प्रसिद्ध केले नसते तर अस्पृश्यांचा वरील आकडा ठरविण्यास दुसरा मार्गच उरला नसता. ह्यांचेच साथीदार इ. ए. गेट हे पुढील म्हणजे १९११ सालच्या खानेसुमारीचे प्रमुख होते, तरी त्यांनी ह्या योजनेप्रमाणें आकडे निराळे प्रसिद्ध केले नाहीत. कर्झनशाहीच कारवाई, बंगालची फाळणी, राजकारणी अस्वस्थता, हिंदु-मुसलमानांचे परस्पर संख्याबळ ठरविण्याचे महत्त्व वगैरे आंगतुक कारणांनी अस्पृश्यांचें संख्यामापन ही अधिक नाजूक बाब होऊं लागली. तथापि ह्या संख्येंत म्हणण्यासारखा मोठा फरक पडला असावा असें वाटत नाही. संख्याशास्त्राच्या अनुसारें तीस वर्षांत या संख्येंत भरच पडलेली असणार. उतार होण्याचे कारण नाही. अस्पृश्यतानिवारकांच्या प्रयत्नांनी अस्पृश्यतेचा जोर कमी झाला आहे. पण त्यामुळे अस्पृश्य ठरलेल्यांची संख्या कमी होण्याचें कारण काय?


वरील कारणामुळें आणि गेल्या दोन दशकांचे रिपोर्ट मिळविणेंही फार त्रासाचें व खर्चाचें झाल्यामुळे मी १९०१ सालचेच आकडे पुन: ह्या लेखांसाठी तपासून पुढील याद्या तयार केल्या आहेत. सत्तावीस वर्षांपूर्वी प्रांतवार अस्पृश्यांच्या कांही प्रमुख जातींची संख्या प्रसिद्ध केली होती. आता लहान सान मिळतील तितक्या सर्व जातींची संख्या शोधून ती पुढे दिली आहे. पूर्वी प्रसिद्ध केलेली प्रांतवार संख्येची एकुणात ५,३२,३६,६३२ झाली तर आतां दिलेली सुमारें ३०० भिन्न जातींची एकुणात ५०,७,२९,२२४ झाली आहे. ही सुमारे २५ लाखांची तूट आलेली आहे ह्याचें कारण त्या वेळी अस्पृश्य मानलेल्या सर्व जातींचा ह्या नवीन यादींत समावेश केलेला नाही. उदाहरणार्थ, छोटा नागपूर प्रांतांतील ओरावन, सांताळ वगैरेंचा समावेश नवीन यादींत केलेला नाही. कारण त्या जाती केवळ जंगली आहेत; त्यापैकी सर्वच अस्पृश्य नाहीत. मुंबई इलाख्यांतील सुमारें २ लाख बेरडांचाही समावेश केला नाही. कारण ह्या लोकांनी शंकराचार्याकडे दाद लावून घेऊन स्वत:ची स्पृश्यता शाबीत करुन घेतली आहे. नवीन यादींच सर्वच अस्पृश्य जातींचा समावेश झाला आहे, असेंही म्हणवत नाही. खर आकडा ठरविणें फार कठीण, जवळ जवळ अशक्य काम आहे. पण तो आंकडा पूर्वीच्याच एकुणातीजवळ अधिक आहे असें धरून चालण्यास हरकत नाही. कांही झालें तरी एक षष्ठांश भारत अस्पृश्य ह्या विधानाला कांही अद्यापि हरताळ लागत नाही.


पुढील नवीन यादींत ३०० च्या वर निरनिराळ्या अस्पृश्य मानलेल्या जातींची नांवे व त्यांची संख्या दिली आहे. त्यांच्या अस्पृश्यतेची कारणें पुढीलप्रमाणे निरनिराळी पांच असूं शकतात. ह्या पांच लक्षणांनुसार कांही प्रमुख जातींचे येथे प्रथम वर्गीकरण करुन दाखविलें आहे.


१. धंद्याच्या हीनपणामुळें
१. मोची, चांभार, ढोर, खालपा, भांबी, डबगर ( कातड्याची कामें करणारे )
२. घोबी, रंग्रज ( रंगारी )
३. पाशी, पारधी, बेडर, भिल्ल, बिल्लव, बागरी, किरात, वेट्टुवन.
४. भंगी, हलालखोर, म्हेतर, डोम.
५. सुणगार, चुन्नर, सुन्नरी ( चुना करणारे )
६. पान, होल्या, भूमीज, भोई, धाशिया, ढाणक (शेतांतले गुलाम).
७. सिंयाल ( ताडीवाले ) , कल्लार, शानार ( दारु गाळणारे )
८. कोळी, जालीया, कैवर्त ( मासे धरणारे )
९. तुबयाझा, डोम, चंडाळ, महार (मसणवटींत काम करणारे )
१०. बांसफोर, बासोर, बुरुड ( वेळूची कामें करणारे )
११. वणकर, तांती, जिनगर ( शिवणें अगर विणणें करणारे. )
१२. धनगर, तांबट, तेली, कुंभार ( विशिष्ट प्रांतांतच हे अस्पृश्य आहेत).
१३. मुसाहर ( उंदीर धरणारे )
१४. चक्कलियन, शिकलगार शक्की ( चाकावर धार लावणारे आणि कातडी कामें करणारे )
१५. मघ, मेघ, गुरुडा, पंबाडा, दास, नाथ, जोगी, वर्णब्राह्मण, कपाली, दावली ( निषिद्धधर्मी व हीन जातींचे पौरोहित्य करणारे )
१६. खाटीक, कसाई.
१७. सनाई, बाजगी, वाजंत्री, परैय्या ( ढोल बडविणारे )


२. प्राचीनकाळी स्वतंत्र, पण पुढे जिंकले गेल्यामुळें

१. मेघ, म्हेर, म्हेतर, म्हार, मोघिया, मोगेर.
२. मांग, मादिग, मातंग
३. बळहाई, ढाणके, डोम
४. नमशूद्र, पोड(पौंड), राजबंसी, कोच, मेच्च, गारो.
५. नाग, नायकडे, नायाडी.
६. माल, मालो, माळी.
७. शबर, बाथुरी, बावुरी.
८. पुलया, चिरुमा, परैया, पळ्ळ, व्हलया.
९. कोल, गोल्ल, कोरी, कोरवी.
१०. येझवा, येळवा, तिय्या.
११. तुबयाझा (अशुभ राजा ), फयाचून
१२. चंड, मुंड, कंड, खोंड, गंड, गोंड.
१३. ओरावन, सांताळ, हो.


३. बौद्ध व इतर पाषंड मानलेल्या धर्मांतून हिंदुधर्माच्या अंमलाखाली बिनशर्त न आल्यामुळें
परैय्या, नमशुद्र, पोड ( पौंड ), बावुरी, सवर, येझवा, येळवा, तिय्या वगैरे.


४. जंगली अवस्थेंत राहिल्यामुळें
भिल्ल, गोंड, खोंड, फासेपारधी, आडवीचिंचि, वगैरे. ( ह्या जाती क्वचित् अस्पृश्य भासतात. पण त्यांना सररास अस्पृश्य कोटींत घालतां येणार नाही. )


५. मनुस्मृतींत वर्णिलेल्या प्रतिलोमामुळें, (व्यभिचारी अथवा गुन्हेगार )
भामटे, ठग, देवदासी, वाघे, मुरळ्या, मातंगी वगैरे.


(पण ह्यांपैकी कोणीच अस्पृश्य झालेले दिसत नाहीत. शेवटची मातंगी अस्पृश्य आहे, पण ती मांग जातीची म्हणून, व्यभिचार करते म्हणून नव्हे. ह्या गोष्टीवरुन, मनुस्मृतींत, जी प्रतिलोम शरीरसंबंधावरुन म्हणजे ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष ह्यांच्यापासून निर्माण झालेली संतति, तिला चांडाल हे नांव देऊन तिला अस्पृश्य व बहिष्कृत ठरविले आहे, तें मत कसें निराधार आहे तें उघड होतें.)

 

वरील वर्गीकरणात कांही जातींची नांवे, पुन: पुन: आलेली आढळतील. विशेषत: पांचही लक्षणांच्या जातीतील सर्वच नसल्या तरी ब-याच व्यक्ति आता अगदी हीन धंदे करीत असलेल्या आढळणें. साहजिक आहे. ज्या जाती पूर्वी स्वतंत्र आणि सुसंपन्न होत्या त्या कालवशात् जित झाल्याने अस्पृश्य व बहिष्कृत केल्या गेल्यावर त्यांना हीन धंदे करणें प्राप्त झालें. आधुनिक काळांत त्यांना थोडा वाव मिळाल्यामुळें त्या जातीपैकी पुष्कळशा व्यक्ती वरिष्ठ धंदे करुं लागल्या आहेत. बंगाल्यांत नम:शूद्र, मद्रासेकडे ( मलबारांत ) येझवा, बिलवा वगैरेमध्ये पुष्कळ विश्वविद्यालयाचे मोठमोठे पदवीधऱ, वकील, डॉक्टर, कौन्सिलर्स, पेढीवाले व पुढारी म्हणून आता चमकूं लागले आहेत. तांबट, तेली, धोबी, माळी, आणि कुंभार, धनगर अशा स्वच्छ जातीही कांही कानाकोप-यांतील प्रांतांतून अस्पृश्य असलेल्या खानेसुमारींत पाहून आश्चर्य वाटतें. गुजराथेंतील ढाणके व माळव्यांतील बळहाई ( बलाई ) ह्या जाती केवळ कृषिकर्म व मोलमजूरी करणा-या असून व्यवहारांत मुळीच अस्पृश्य नाहीत. आता अशा जातींची अस्पृश्यता व्यवहारांत बहुतेक नष्ट झालेली आहे. पण एकेकाळी अशांनाही हा डाग लागला होता, ह्यावरून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची व्यापकता किती मोठी आहे हें दिसतें. म्हणून ह्यांचा उल्लेख करावा लागला आहे. ह्या जाती स्वच्छ धंदे करणा-या असून, आणि पूर्वीपासून ह्या अस्पृश्य होत्याच असा पुरावा नसून, त्या आता अस्पृश्य मानल्या जाण्याचें कारण, ह्या मध्यन्तरींच्या काळांत बौद्ध झाल्या असल्या पाहिजेत व ह्या लवकरच ब्राह्मणी हिंदू धर्मांच्या हुकमतीखाली न आल्यामुळें अस्पृश्य मानल्या गेल्या. ह्या बाबीचा विचार पहिल्या खंडांत झालाच आहे.


संख्येची आणि व्याख्येची ओढाताण
इ. स. १९०७-८ चे सुमारास मी इ. स. १९०१ च्या खानेसुमारींतून प्रथम हिंदुस्थानांतील एकंदर अस्पृश्य मानलेल्या लोकांची वट्ट संख्या पांच कोटी बत्तीस लक्ष छत्तीस हजार सहाशें बत्तीस ( ५,३२,३६,६३२ ) ही प्रसिद्ध केल्यापासून ह्या प्रचंड संख्येचीच नव्हे तर माझ्या व्याख्येची सारखी ओढाताण चाललेली पाहून केव्हा केव्हा बरीच करमणूक होते ! ह्याच सुमारास बंगाल्यांत फाळणीची मोठी चळवळ उडाली. त्या वेळी हिंदू-मुसलमानांची मोठी तेढ पडली. अस्पृश्यांना ज्याअर्थी हिंदू इतके वाईट वागवीत आहेत त्याअर्थी त्यांच्यांतील जवळ जवळ एक चतुर्थांश मानीव अस्पृश्य भागाची गणना हिंदु समजून त्यांच्यात न व्हावी अशा मुसलमानांच्या सूचना येऊ लागल्या. उलट हिंदूंना अस्पृश्य भाग निदान राजकारणांपूरता तरी आपल्यातून बाहेर फुटून जाईल की काय ही भीति पडून त्यांनी हा भाग अस्पृश्य असला तरी हिंदूच आहे असा आग्रह धरिला. पुढे लवकरच १९९१ची खानेसुमारी होणारी होती. सरकारांनी आपलें १९०१ सालचें धोरण बदलून, हिंदु समाजाच्या निरनिराळ्या दरजांच्या निरनिराळ्या वट्ट संख्या प्रसिद्ध करण्याचें स. १९९१ च्या खानेसुमारींत टाळलें. अस्पृश्य वर्ग हे सर्व हिंदू नसून त्यांच्यांतील बराच भाग पिशाचपूजक (Animist) असावा असें भासविण्याचा ते विचार करुं लागले. तथापि कोणी म्हण्यासारखा उद्योग करुन वरील वट्ट आंकडा आणि व्याख्या परिणामकारक रीतीने बदललेली माझ्या तरी ऐकिवांत नाही. मात्र ही संख्या वरच्याहून लहान ठरेल तर बरें, अशी हिंदू, मुसलमान व सकार ह्या सर्वांचीच अंतर्गत इच्छा-मग ती कितीही भिन्न हेतून असो आहे हें खरें; पण केवळ इच्छेने आकडा कसा बदलावा !


पुढील कोष्टकें पाहिल्यास, आर्य, द्राविड, सिथियन, मोगल इत्यादि वंश दृष्टीने गणना करुन दिलेली अस्पृश्यांची वट्ट संख्या सन १९०१ साली ५,३१,९६,६३२ झाली आणि हल्लीच्या सुमारें ३०० निरनिराळ्या अस्पृश्य मानलेल्या जातींची प्रांतवार संख्या ५,१७,३८,६७३च भरली असें दिसून येईल ( पृ. १०१, १०२ पहा. ) ह्यांत तफावत जवळ जवळ १५ लाखांची येते तिचीं कारणें मी वर दिलेलींच आहेत. ह्यांपैकी मुंबई इलाख्यांतच १० लाखांची तूट, तर पंजाब, काश्मीर, राजपुताना ह्या भागांत जवळ जवळ १२ लाखांची वाढ दिसून येते. ही तफावत कांही जातींची गणना एके ठिकाणीं अस्पृश्यांत झाल्यामुळे व दुसरीकडे त्या जातीची न होतां निराळ्याच जातींची झाल्यामुळें पडलेली असली पाहिजे. माझें हे म्हणणें, प्रत्यक्ष खानेसुमारींतील सर्व प्रांतांचे आकडे पुढे ठेवून आकडे मोडण्याची दगदग केल्याशिवाय कोणाच्या लक्षांत यावयाचें नाही. ह्या तीस वर्षांत अस्पृश्यतानिवारणाच्या प्रयत्नाने ही संख्या फर थोडी कमी झाली असावी. उलट अखिल हिंदुस्थानची लोकसंख्या पांच साडेपांच कोटींनी वाढलेली आहे त्या वाढीचा हिस्सा अस्पृश्यांना मिळून त्यांची संख्या ६ कोटीजवळ जाणें संभवनीय आहे. निदान ५|| कोटींच्या खाली जाण्याचें कांही कारण नाही.


मुंबई इलाख्यांत दोन वर्षांपूर्वी स्टार्ट कमिटीने चौकशी केली. तिने ज्या जातींचा समावेश केला आहे त्यांची वट्ट संख्या सुमारे १४ लाखच दिली आहे. पण त्यांचे तपशीलवार आकडे न देतां त्यांनी हा वट्ट आकडाच कोठून मिळविला हें कळत नाही. माझा आकडा २१ लाख आहे, तो ३० वर्षांपूर्वीचा आहे.


ह्या संख्येचा असा गोंधळ आणि ओढाताण होण्याचें दुसरें एक मुख्य कारण असें की अस्पृश्यांची व्याख्या ठाम करणें आणि ती ठरली तरी तशा व्याख्येबरहुकून खानेसुमारींतील माडोत्री गणकांकडून नेमकी गणना होणें ही सोपी गोष्ट नाही. हिंदुस्थानांत, मी पहिल्या खंडांत ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे "अस्पृश्य" ठरणारे वर्गच नुसते आहेत असे नव्हे, तर जंगली जाती, आणि जंगली असोत नसोत, गुन्हेगार समजले जाणारे इतर वर्ग आहेत. ह्या दुस-या दोन भिन्न वर्गांची संख्या होतां होईल तोंवर माझ्या वरील कोष्टकांतून मी येऊ दिलेली नाही. ह्या तीन्ही, म्हणजे १ अस्पृश्य, २ जंगली आणि ३ गुन्हेगार वर्गांचा एकमेकांत गणनेच्या वेळी भेसळ होणें, कितीही खबरदारी घेतली तरी अगदी सहज आहे. राजकारणाच्या, राज्यकारभाराच्या, धर्माभिमानाच्या, सामाजिक इज्जतीच्या अगर इतर कोणत्याही अशाच आगंतुक सबबीमुळें वरील खबरदारींत ढिलाई झाली की अस्पृश्यतेची मुळी व्याख्याच बदलते; आणि ती तशी बदललेली वरील कोणाही बेखबरदार व पक्षभिमानी माणसांच्या, अगर त्यांच्या अडाणी हस्तकांच्या मुळी लक्षातच येत नाही. त्यामुळें हा संख्येविषयी वाद वेळोवेळी माजतो. ह्या सर्व गोष्टी पूर्णपणें लक्ष्यांत घेऊनच मी वरील कोष्टके जबाबदारीपूर्वक पुन: पुन: तपासून प्रसिद्ध करीत आहें.

दहापांच लाख संख्या कमी झाली काय किंवा वाढली काय, ही मोठी गोष्ट नाही. साधारण मानाने हिंदुस्थानाच्या वट्ट लोकसंख्येचा एक षष्ठांश आणि हिंदूंच्या वट्ट लोकसंख्येचा एक चतुर्थांश भाग अस्पृश्य मानला जात आहे, हें खानेसुमारीचे विधान दुर्देवाने अद्यापि अढळच आहे !


अस्पृश्यांच्या संख्येची व व्याख्येची अशी ओढाताण चालली असता अलीकडे दोन तीन वर्षें हिंदुस्थानची राज्यपद्धति सुधारण्याचा विचार ब्रिटिश पार्लमेंट करु लागली आहे त्यामुळें तर सर्व जाती आणि पक्ष ह्यांमधून धुमाकूळ चालला आहे. अशा परिस्थितींत वरील ओढाताण अधिकच वाढली आहे. लॉर्ड लोदियनच्या प्रमुखत्वाखाली जी फ्रँचाइस कमिटी नेमली होती तिचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. त्यांत ह्या व्याख्येचा व संख्येचा सर्व बाजूंनी विचार करूनही त्यांना निर्णायक मत देतां आलें नाही अशी कमिटीने कबुली दिली आहे. तरी शेवटीं जी कामचलावू व्याख्या त्यांनी ठरविली ती मी वर केलेली आहे तशीच ठरविली. म्हणजे, धंदा, दर्जा, सांपत्तिक अथवा शैक्षणिक स्थिती कशीही असो, ज्यांना रुढीमुळें वरिष्ठ म्हणविणारे हिंदू अस्पृश्य आणि बहिष्कृत मानतात, ते सर्व अस्पृश्य होत. ह्या लोदियन रिपोर्टाचें पुस्तक पहिलें पान ११९ वर, अखिल हिंदुस्तानांतील अस्पृश्यांची संख्या निरनिराळ्या कमिट्यांनी अगर खात्यांनी कशी निरनिराळी ठरविली आहे तें एका कोष्टकांत दिलें आहे. हें कोष्टक खाली उद्धृत केलें आहे. यांतील आकडे १० लाखांचे आहेत. ह्यांत संस्थानांतील अस्पृश्यांचा समावेश केला नाही. पण यानंतर येणा-या माझ्या कोष्टकांतील आकड्यांत संस्थानी आकडे अंतर्भूत आहेत.


लोदियन कमिटीच्या रिपोर्टातील संकलनात्मक कोष्टक - (PDF साठी येथे क्लिक कारा) 

 

अखिल हिंदुस्थानातील ब्रह्मदेशाशिवाय अस्पृश्य आणि एकूण हिंदूंची प्रांतानिहाय संख्या - (PDF साठी येथे क्लिक कारा)

 

अखिल हिंदुस्थानांतील अस्पृश्यांची प्रांतवार संख्या -  (PDF साठी येथे क्लिक कारा)