प्रस्तावना

इ. स. १९०८ च्या सुमारास अस्पृश्यतेसंबंधीं मी माझा मराठींतील पहिला विस्तृत निबंध लिहिला.  तो 'बहिष्कृत भारत' ह्या मथळ्याखालीं इ. स. १९०८ च्या डिसेंबर महिन्याच्या 'मनोरंजन' मासिकांत सचित्र प्रसिद्ध झाला.  तोच पुढे श्रीमंत गाईकवाड महाराजांच्या आज्ञेने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. ह्यापूर्वीं इ. स. १९०४ सालापासून ह्याच विषयावरील माझे इंग्रजींतील लेख, आकडे व इतर प्रमाणांसह, 'टाइम्स ऑफ इंडिया,' 'सोशल रिफॉर्मर' वगैरे पत्रांतून प्रसिद्ध होत होते. अस्पृश्यतानिवारणासाठी आमच्या देशांत गेल्या शतकापासून कोणते व कसे प्रयत्‍न झाले ह्याचा समग्र पण संक्षिप्‍त इतिहास मी इ. स. १९२३ सालीं लिहिला, तो मराठी 'ज्ञानकोशांत' प्रसिद्ध झाला आहे. तथापि अस्पृश्यतेची उत्पत्ति, विकास, आणि ती घालविण्याचा पद्धतशीर उपाय ह्या विषयावर समाजशास्त्राच्या दृष्टीने सोपपत्तिक विचार अद्यापि झाला नाही.  निदान तो कोणी केलेला माझे तरी आढळांत नाही.

हिंदुस्थान सरकाराने खानेसुमारीचा अहवाल, डिस्ट्रिक्ट आणि इंपीरियल गॅझेटिअर्स, एथ्नॉग्राफिक सर्व्हे इ. ग्रंथावली सुरू केल्यापासून, कांही प्रसिद्ध पाश्चात्य समाजशास्त्र्यांचें लक्ष्य भारतीय वर्णव्यवस्थेकडे लागलें आहे. इवेट्सन, सिनार्ट, नेसफील्ड, रिस्ले, रस्सल इ. शोधकांनी जातिभेदाची मीमांसा करतांना ओघाने 'अस्पृश्यां'विषयीं कांही प्रासंगिक विचार प्रकट केले आहेत.  पण प्रत्यक्ष अस्पृश्यता ही संस्था जगांत कशी निर्माण झाली, व तिचा विकास विशेषतः भरतखंडांत कोणकोणत्या कारणांनी व टप्प्यांनी घडून आला ह्या चित्तवेधक विषयासंबंधीं म्हणण्यासारखी एखादी उपपत्ति कोणी ठरविलेली माझे आढळांत अद्यापि आलेली नाही. 

मुंबई विश्वविद्यालयांतील तरुण पदवीधरांकडून वेळोवेळीं अस्पृश्यता ह्या विषयावर एक पारितोषक निबंध मागविण्यांत येत असतो.  परीक्षणासाठी हे निबंध मजकडे येत असतात. त्यावरून पाहतां वृद्धांप्रमाणेंच तरुणांनीही ह्या विषयाच्या उपपत्तीकडे आजवर दुर्लक्ष्यच केलेलें मला आढळतें. रा. सातवळेकरांनी 'स्पर्शास्पर्श' नांवाचें एक सुंदर पुस्तक संस्कृतांतील उतारे देऊन प्रसिद्ध केलें आहे.  कांहीं विद्वान ख्रिस्ती मिशनर्‍यांनीं विवक्षित 'अस्पृश्य' जातींची स्थिति प्रत्यक्ष निरीक्षण करून निःपक्षपाताने प्रसिद्ध केली आहे.  तथापि अशा त्रुटित ग्रंथांतूनही एकादी ऐतिहासिक उपपत्ति ठरविण्याचा नुसता प्रयत्‍नही झालेला दिसत नाही.  एकंदरींत नव्या, जुन्या, तरुण, वृद्ध, स्वकीय, परकीय इ. कोणत्याही विद्वानांच्या डोळ्यांवर हा विषय शास्त्रीय दृष्टीने अद्यापि यावयाचाच आहे.  व्यवहारिक गोंधळ मात्र बराच गाजत आहे.  त्यांत सरकारचा डफ, कांग्रेसचें तुणतुणें, हिंदुमुसलमानांचा नाच आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतरांच्या टाळ्या, ह्यांचा एकच कल्लोळ माजला आहे.  ह्या गोंधळाचा प्रस्तुत प्रयत्‍नाशीं मात्र कसलाही संबंध पोचत नाही, हें टीकाकारांनी कृपा करून ध्यानांत राखावें.  हा प्रयत्‍न केवळ शास्त्रीयदृष्टीने व निर्विकार मनाने करण्यांत आला आहे.  वाचकांनीही केवळ त्याच प्रकाराने त्याचा स्वीकार करावा.

मजकूर लिहिण्याचे कामीं वगैरे माझे परलोकवासी मित्र कृष्णराव गोविंदराव पाताडे ह्यांची फार मदत झाली.  पण हा प्रथम भाग प्रसिद्ध झालेला पाहण्यासही ते जगले नाहीत, ह्याबद्दल मला फार खेद होत आहे.  ह्या ग्रंथाचा बराच भाग माझे जवळ बरेच दिवस लिहून पडला होता.  तो प्रसिद्ध करण्याचें श्रेय नवभारत ग्रंथमालाकारांनी स्तुत्य चिकाटी दाखवून आपलेकडे घेतलें हें जाहीर करणें माझें कर्तव्य आहे.  ह्या विषयाचें माझें अध्ययन अद्याप चालूच आहे.  अद्यापि पुढील दोन खंड दुसर्‍या पुस्तकाच्या रूपाने लिहावयाचे आहेत.

श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड ह्यांनी हा अल्पग्रंथ त्यांना अर्पण करण्याची परवानगी दिली, ह्याबद्दल मी त्यांचा फार ॠणी आहें.

विठ्ठल रामजी शिंदे
गुरुवार २० जुलै इ.स. १९३३
अहल्याश्रम, नानाची पेठ,
पुणें शहर.