बालपण

हायस्कूलचे शिक्षण
विठ्ठल रामजींच्या लहापणीच त्यांच्या घराची सुबत्ता जाऊन ते दुर्धर दारिद्र्याच्या फेर्‍यात सापडले होते.  असे असले तरी ह्या दारिद्र्याचे सावट त्यांच्या बाल्यावर पडले नाही.  ह्याचे प्रमुख कारण म्हणजे आईचे प्रेमळपणाने ओतप्रोत भरलेले अंतःकरण व तिची स्वाभाविक आनंदी वृत्ती याचा अखंड अनुभव त्यांना मिळत होता.  त्याचप्रमाणे, दुसरे कारण म्हणजे दारिद्र्याच्या प्रतिकूल स्थितीतही त्यांच्या वडिलांची टिकून राहिलेली उदार मनोवृत्ती व त्यांनी शाबूत ठेवलेला प्रतिष्ठितपणा.  आई-वडिलांच्या प्रेमळ, उदार सहवासात लहानग्या विठूचे बालपण गेले व त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध अंगांचे पोषण झाले.

विठ्ठलाचे वय पाच-सात वर्षांचे असताना त्याचे आजोबा बसवंतराव वारले.  तेव्हापासून अकरा वर्षांचे वय होईपर्यंतची म्हणजे इ. स. १८७९ पासनू १८८४ पर्यंतची पाच वर्षे ही त्याच्या प्राथमिक शिक्षणाची होती.  वडिलांनी लहानग्या विठूच्या शिक्षणाच्या आरंभाचा एक लहानसा विधी साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एका शुभमुहूर्तावर करविला.  त्यासाठी त्यांनी रा. बाळा काणे नावाच्या शिक्षकांना बोलाविले.  त्यांनी 'श्रीगणेशाय नमः' हा धडा लहानग्या विठूचा हात धरून गिरविला.  प्राथमिक शाळेत लहान वयामुळे स्वाभाविकपणेच त्याचे फारसे लक्ष लागले नाही.  मराठी शाळेत चौथीनंतरही पाचवीचे एक वर्ष त्याला घालवावे लागले.  त्यामुळे मराठी कवितेत आणि गणितात त्या वेळच्या मानाने त्याची बरीच प्रगती झाली.  मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ आणि व्याकरण त्याला चांगले कळत असे.  कुणी शाळा पाहावयास आले म्हणजे त्याच्याकडून पंतोजी कविता म्हणून घेत असत व लहानगा विठू त्या चांगल्या सुरावर व ऐटीत म्हणत असे.

विठूच्या आयुष्यातील १८८५ ते १८९१ अखेरची सात वर्षे महत्त्वाची होती.  हा त्याच्या हायस्कूल शिक्षणाचा काळ.  विठूच्या वृत्तीत फरक पडावा अशी एक घटना १८८५ च्या पावसाळ्याच्या आरंभी घडली.  ती म्हणजे त्याचा वडील भाऊ परशुराम ह्याचा अकाली झालेला मृत्यू.  त्यामुळे विठूच भावंडांमध्ये वडील झाला आणि त्याचा बालपणाचा हूडपणा कमी होऊन तो गंभीर, विचारी व अभ्यासी बनला.  त्या वेळी त्याला नुकतेच अकरावे वर्ष संपून बारावे वर्ष लागले होते.

विठ्ठलाने हायस्कुलात प्रवेश केला त्या वेळी श्री. त्रिंबकराव खांडेकर यांना पुण्याहून हेडमास्तरांच्या जागेवर आणले होते.  त्यांचा स्वभाव सुशील, नेमस्त, गंभीर आणि करारी होता.  त्यामुळे गावात व दरबारात त्यांचा एक प्रकारचा दबदबा होता.  शाळेला हायस्कूलचा पूर्ण दर्जा मिळाल्यानंतर श्री. वासुदेवराव चिरमुले बी.ए. हे पहिले पदवीधर शिक्षक शाळेला लाभले.  हायस्कूलमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिले वर्ष विठ्ठलाला जड गेले.  दुसर्‍या वर्षांपासून मात्र इंग्रजी भाषेची व इतर सर्वसामान्य विषयांची त्याला गोडी लागली.  शिक्षक सहानुभूतीने शिकविणारे होते.  विठ्ठलाची हुशारी पाहून ते त्याचे कौतुक करू लागले.  मराठी शाळेहून हायस्कूलमधील वातावरण वेगळे असल्याने व शिक्षकवर्गाकडून कौतुक होत असल्यामुळे त्याचे मन शाळेच्या अभ्यासात आणि वातावरणात चांगलेच रमले.

इंग्रजीच्या अभ्यासामुळे एक नवेच विश्व विठ्ठलाच्या ग्रहणशील मनासमोर खुले झाले.  तिसर्‍या इयत्तेपासून इंग्रजी राहणीचे धडे त्याला वाचायला मिळत.  इंग्रजी शेताचे वर्णन, इंग्रजी झाडाझुडपांची नावे, इंग्रजी खेडी, इंग्रजी कुंपणावरील निरनिराळ्या जंगली वेली, फुले वगैरे नवीन देखावे वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्या मनाला देऊ लागले.  श्री. आप्पा काळे हे रसिकतेने शिकवीत व विठ्ठल समरसून शिकत असे.  इंग्रजी चौथ्या इयत्तेवर त्याचे आवडते शिक्षक श्री. आप्पा काळे हे पुन्हा आले.  सँडफर्ड ऍंड मर्टन  हे अभ्यासक्रमातील पुस्तक त्यांना फार आवडे.  त्यामधील नवीन व उदार विचार, बाळबोध भाषा, इंग्रजी पोशाखाची, राहणीची व वनश्रीची शब्दचित्रे यांमुळे इंग्रजी राहाणीविषयी त्याचे कुतूहल दिवसेंदिवस वाढू लागले.  योगायोगाने तरुणपणी विठ्ठल रामजी हे इंग्लंडातील उत्तमोत्तम अशा ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात दोन वर्षे राहिले.  तेव्हा तेथील खेड्यापाड्यांत जाऊन शेतात, कुंपणात फिरून त्यांनी जे देखावे पाहिले त्याची पूर्वस्वप्नेच जणू काय जमखंडीसारख्या खेडवळ शाळेतील क्रमिक पुस्तके वाचत असताना पडत होती.  पाचव्या इयत्तेत लँबस् टेल्स  या पुस्तकाद्वारा त्यांची कविकुलगुरू शेक्सपियरची भेट झाली.  सहाव्या इयत्तेत रीडिंग्ज फ्रॉम द स्पेक्टेक्टर  हे पुस्तक श्री. चिरमुले यांनी त्यांना शिकविले; यात ऍडिसनच्या खर्‍या बाळबोध इंग्रजीचा व ताज्या विचारांचा नमुना त्याला कळाला.  अशा तर्‍हेने ग्रहणशील वयातच त्याच्या हृदयावर इंग्रजी भाषेचाच नव्हे तर इंग्रजी संस्कृतीचा अनुकूल असा परिणाम झाला.

एखादा विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमातून उत्कट स्वरूपाचा आनंद घेऊ शकतो ही गोष्ट दुर्मीळच म्हणावी लागेल.  विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी त्या वयातही असणारी तरल संवेदनशीलता व तीव्र ग्रहणशीलता यांमुळे ह्या हायस्कूलमधील अभ्यासक्रमातून ते अपूर्व असा आनंद घेऊ शकत होते.  त्यांनीच या अनुभवाचे वर्णन केलेले आहे.  ''पाचव्या इयत्तेत संस्कृत, बीजगणित आणि भूमिती आणि सहावीत रसायन, यंत्रशास्त्र, भूगोल, खगोल इत्यादी आधुनिक शास्त्रांची मूलतत्त्वे ह्यांचा उपक्रम झाला.  एखाद्या मनोर्‍यावर चढत असताना प्रत्येक मजल्याभोवतालचे क्षितिज अधिकाधिक विस्तीर्ण होऊन ज्याप्रमाणे जास्त प्रदेश दृष्टीच्या टापूत येतो व आनंद वाटतो त्याप्रमाणे माझा हा हायसकूलमधील अभ्यासक्रम मला फार चित्तवेधक व बोधकारक झाला.  त्यामुळे माझ्या घरातील भयानक दारिद्र्याच्या वेदना मला कधीच भासल्या नाहीत, की माझ्या शिशुदशेच्या सहजानंदात कधी खंड म्हणून पडला नाही.  ह्या माझ्या सदानंदी उत्साहामुळे माझ्या आईबाबांचे दुःखही हलके झाले.''१

इंग्रजीचा प्रभाव जरी विठ्ठलावर उत्कट स्वरूपात पडला असला तरी तो मराठी भाषेला व संस्कृत साहित्याला मुळीच पारखा झाला नाही.  त्याच्या रसिकतेत पक्षपातीपणा नव्हता.  उलट व्यापकता होती.  रघुनाथ पंडितांच्या नलदमयंती आख्यानाचा आणि नवनीतातील अन्य कवितांचा ठसा त्याच्या मनावर उमटला.  त्यामधील कविता तो आपल्या आईला व बहिणींना म्हणून दाखवून मोठ्या रसिकतेने अर्थ सांगे.  मराठीवरील अकृत्रिम प्रेम वाढण्यास अधिक साधने घरीच होती असे विठ्ठल रामजी नमूद करतात.  श्रीधर, महिपती, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे मराठी कवींच्या आणि संतांच्या ग्रंथांचे पारायण स्वतः त्यांचे बाबा करीत असत.  ते वाचून इतरांस पुराणिकांप्रमाणे अर्थ सांगत असत.  विठ्ठलही आपल्या वडिलांचे अनुकरण करून हरिविजय-पांडवप्रतापासारखे ग्रंथ चौथ्या-पाचव्या इयत्तेतच वाचून आपल्या वर्गातील मुलांना त्याचा अर्थ सांगत असे.

सहाव्या इयत्तेत संस्कृतचा त्याचा परिचय झाला.  श्री. गणेशशास्त्री जोशी या नावाचे जुने शास्त्री त्यांना संस्कृत वाङ्‌मय शिकवीत असत.  अधिक वाचन करण्याच्या हेतूने शास्त्रीबुवांच्या घरी इतर विद्यार्थ्यांसमवेत विठ्ठल जात असे.  शास्त्रीबुवा गोठ्यात गाईचे शेण काढीत असताना तोंडात तंबाखूचा बार भरून, त्याच्या मधून मधून पिचकार्‍या मारीत, इतके तिकडे फिरत या मुलांना रघुवंशातील श्लोक सांगत.  बाणभट्टाची कादंबरी  आणि अन्य वाङ्‌मय गणेशशात्र्यांनी अत्यंत रसिकतेने या विद्यार्थ्यांना शिकविले.  आपण जातीने मराठी म्हणून शास्त्रीबुवांनी कधीही भेदभाव दाखविला नाही असे विठ्ठल रामजींनी आवर्जून नमूद केले आहे.

हायस्कूलमध्ये विठ्ठल रामजींनी अभ्यासात जी गती दाखविली तिचे श्रेय ते आपल्या रसिकतेला देतात; बुद्धिमत्तेला नव्हे.  त्यांनी म्हटले आहे की, ''गणित असो वा शास्त्र असो, भाषा असो वा व्याकरण असो, परकीय इंग्रजी असो वा मृत संस्कृत असो की मातृभाषा चालू मराठी असो, माझी गती सारखीच अकुंठितपणे चाले.  सर्व हायस्कूलच्या अभ्यासक्रमात मला अभ्यासाचे श्रम म्हणून कधी भासलेच नाहीत.  ह्याचे कारण माझ्या बुद्धीचे तेज नसून (मी बुद्धीने साधारणच आहे) केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हे मला येथे नमूद करावयाचे आहे.  ही रसिकता मला शाळेपेक्षा घरातच अधिक, गुरूपेक्षा माझ्या आईबापांकडूनच जास्त मिळाली हे खास.  माझ्या घरी जातिभेद नव्हता, तसा माझ्या हृदयात संस्कृतिभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता.  सौंदर्य जेथे भेटेल तेथे ऊर्ध्वहस्ताने स्वीकारण्यास मी लहानपणापासूनच एका पायावर तयार आहे.  मग ते इंग्लंडातले असो की स्वदेशातले असो, शहरातले असो की खेड्यातले असो, संस्कृत असो की प्राकृत असो, ते सहज व स्वाभाविक असले की पुरे.  मी त्याला बिलगलोच म्हणून समजावे.''२

सोबती व खेळ
इंग्रजी पहिल्या इयत्तेत असताना विठ्ठलाचा वडील भाऊ परशुराम हा अकाली मृत्यू पावला हा त्याच्या मनावर मोठाच आघात होता.  जोपर्यंत हा वडील भाऊ जिवंत होता तोपर्यंत त्याच्या मागे मागेच दुय्यमाप्रमाणे लहान विठ्ठल वागत असे. आपल्याला सांभाळून घेणारा शांत स्वभावाचा वडील भाऊ परशुराम वारल्यानंतर विठ्ठलाला एकाएकी उघडा पडल्यासारखे वाटले.  भाऊ होता तोपर्यंत भावंडे हेच त्याचे मित्रमंडळ होते.  दुसर्‍या इयत्तेत गेल्यानंतर व अभ्यासात प्रगती दिसू लागल्यानंतर, वर्गात कायमचा पहिला नंबर पटकावीत राहिल्यानंतर विठ्ठलाभोवती सोबत्यांचा घोळका कायम जमू लागला.  सुरुवातीला त्याच्या मित्रमंडळात मराठा, लिंगायत, न्हावी, मुसलमान अशी मुले असायची.  तो वरच्या वर्गात जाऊ लागल्यानंतर ब्राह्मणेतर मित्रमंडळी मागे पडून ब्राह्मण मुलांची मित्रमंडळात संख्या वाढली.  विठ्ठल रामजींचा वाडा एकीकडे निवांत होता.  अभ्यासाला बसावयाला जागा पुष्कळ होती.  पुस्तकांचा साठा भरपूर.  अभ्यासात अडचण आली तर सांगायची विठ्ठलाची सदैव तयारी.  सोबत्यांवर अकृत्रिम प्रेम करणारे आईबाप, यामुळे विठ्ठलाच्या भोवती सदैव सोबत्यांचा गराडा असायचा.  अभ्यास करीत करीत खेळ आणि खेळत खेळत अभ्यास असा ह्या मुलांचा कार्यक्रम असायचा.  तिसर्‍या इयत्तेपासून सातवीअखेर पाच वर्षांपर्यंत त्यांचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार विद्यार्थी वसतिगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना होता असे त्यांनी वर्णन केले आहे.  त्यांच्या मित्रमंडळात तिसर्‍या-चौथ्या इयत्तेत दामू रानडे, सखाराम गोखले, वामन घारे यांची भर पडली.  तर पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून विष्णू देशपांडे, हणमंत कुलकर्णी, रामू पाटील, अंतू हनगंडी इत्यादिकांची भर पडली.  मुधोळच्या शाळेतून आलेली ही सर्व मुले देशस्थ ब्राह्मणांची होती.  त्यांच्या आईबापांनी एका घरी जेवणा-राहण्याची त्यांची सोय करून दिली होती.  ती सर्व विठ्ठल रामजींच्या घरी त्यांच्या भावंडांप्रमाणे नेहमी पडून असत.  सातव्या इयत्तेत कुंदगोळाहून जनार्दन सखाराम करंदीकर हे जमखंडीच्या शाळेत आले.  पुढे ते व विठ्ठल रामजी बी. ए. पर्यंत बरोबर शिकत असत.  अखेरपर्यंत ते त्यांचे स्नेही होते.  तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे हे तर विठ्ठल रामजींचे आयुष्यभराचे जिवलग मित्र राहिले.  या हायस्कूलच्या काळातच ह्या मित्रमंडळींच्या सहवासात विठ्ठल रामजींच्या ठिकाणी असणारी  पुढारपणाची क्षमता दिसून येते.  त्यांची अनेकांना बरोबर घेऊन जाण्याची तयारीही याच काळात झाली असे जाणवते.

खेळ
विठ्ठलाचा स्वभाव आणि शील बनण्यात सोबत्यांच्या सहवासाचा त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबरच्या खेळाचा मोठा भाग होता.  एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात जमखंडी गाव खेडेवजाच होते.  खेळायला मोठमोठी क्रीडांगणे व खेळ शिकविणारे शिक्षकही होते.  पण खेड्यांतील संस्कृतीमध्ये साधनांवर अवलंबून असणारे खेळ खेळता येत नसले तरी साधनाशिवायचे खेळ नैसर्गिक वातावरणात मनसोक्त खेळले जात.  विठ्ठलाचे बाबा स्वतः फारसे बैठे खेळ खेळत नसले तरी त्यांनी गंजीफा, बुद्धिबळे, सोंगट्यांचे हस्तिदंती फासे वगैरे खेळांची साधने घरी करून ठेवली होती.  लहानपणी विठ्ठल बैठा खेळ खेळायचा तो म्हणजे सोंगट्यांचा.  त्याचा वडील भाऊ होता तेव्हा दिवाळीच्या सणात सोंगट्यांच्या खेळाची धमाल चालू असे.  हा खेळ मोठ्या ईर्षेचा.  चिडून भांडल्याशिवाय या खेळाची समाप्‍ती व्हायची नाही.  एका एका बाजूला दहा-बारा गडी बसलेले असायचे.  खेळ संध्याकाळी चालू होऊन उजाडेपर्यंत चालायचा.  भांडण केव्हा केव्हा हातघाईवरही यावयाचे.  त्यांचा आलगूरचा मामा वडील भावापेक्षा एक-दोन वर्षांनी मोठा होता.  तो विरुद्ध बाजूला असे.  मामा फार विनोदी, रडी खेळणारा, चिडखोरांना अधिक चिडवून मजा बघणारा आणि पट्टीचा पहिलवान, दुसर्‍याला चिडवून स्वतः मात्र कधीच चिडत नसे.  भांडण हातघाईवर आल्यावर गलिव्हरच्या अंगावरील लिलिपुटाप्रमाणे विठ्ठल आणि परशुराम हे दोघे बंधू मामाच्या पाठीवर चढून लाथा-बुक्क्यांचा मारा करीत आणि मामा मात्र खाली वाकून त्यांना अधिकच खिजवीत असे.  स्वयंपाकघरातून आई येऊन आपल्या भावालाच नावे ठेवीत हे गमतीचे भांडण सोडवीत असे.  मोकळ्या जागेत खेळावयाचे मैदानी खेळ म्हणजे आट्यापाट्या, हुतुतू, खो-खो हे खेळही मुले खेळत असत.  त्याशिवाय किर्र नावाचा आडदांडपणाचा खेळही खेळायचे.  त्याशिवाय सूरपारंब्या, सूरपाट्या हे खेळ हमखास दुखापती करून देणारे, कपडे फाटणारे खेळ मोठ्या हिरिरीने खेळत असत.  ह्या खेळणार्‍या मुलांच्या टोळीचा मुख्य नायक म्हणजे विठ्ठल.  गावचे लोक, विशेषतः शिक्षक मंडळी, ह्या मुलांच्या खेळाचे कौतुक करीत असत.  विठ्ठल हा खेळगड्यांचा कंपू घेऊन दरसाल उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कुठेतरी नदीच्या काठी किंवा डोंगराच्या दरीत वनभोजनाला जात असे.  त्यांच्यात लिंगायत, मराठे, ब्राह्मण, मुसलमान वगैरे सर्व जातींचे विद्यार्थी असत.  जातिभेद त्यांच्या गावी नव्हता.  सोवळी पोरे ह्या कंपूच्या वार्‍यालाही उभी राहत नसत.  जनुभाऊ करंदीकर असल्या सोवळ्याचा होता.  विठ्ठलाच्या वाड्यात हा कंपू रात्रंदिवस पडलेला असे.  मोठ्या अंगणापासून आत स्वयंपाकघरापर्यंत व देवघरापर्यंत त्यांचा धुडगूस चाले.  विठ्ठलाच्या दोन बहिणी जनाक्का व तान्याक्का ह्या लहान अल्लड असत.  त्याही मुलांच्या धांगडधिंग्यात सामील होत.  विठ्ठलाच्या आईला कोणीच भीत नसत.  तिला सर्व आपलीच पिले वाटत.  कित्येक वेळा स्वयंपाकघरातील खाण्याच्या पदार्थावर हल्ला होई.  त्यांचे गरिबीतील शिळे तुकडे तेरदाळचा विष्णू आणि जमखंडीचा सिनू ही श्रीमंतांची मुले मिटक्या मरीत खात.  मग विठ्ठलाच्या आईला अपरंपार प्रेम वाटणे स्वाभाविक होते.  विठ्ठल रामजींच्या भावी चरित्राची, समाजसुधारणेची ही पूर्वचिन्हेच होती.  त्याचे चरित्र असे अंगणातल्या जिवंत धांगडधिंग्यात आणि समानशील सवंगड्यांच्या धसमुसळेपणाच्या जिव्हाळ्यात जन्म पावत होते.

लहान विठ्ठलाच्या वर्तनातील वेगळेपणा, धाडशीपणा व विक्षिप्‍तपणा त्याच्या लहानसहान खोड्यांतून दिसून येत असे.  (जमखंडीचे श्रीमंत अप्पासाहेब यांनी रामतीर्थ ह्या डोंगरावर आपली वस्ती मांडली व बसवन्ना या लिंगायत देवाची यात्रा रामतीर्थ लोकप्रिय करण्यासाठी वर डोंगरात आपल्या राहण्याच्या जागी नेली.).  रामतीर्थास जाण्यासाठी एक वरची डोंगराची व दुसरी खालची सपाट, गाड्या वगैरे जाण्यासाठी, अशा दोन वाटा असत.  ह्या दोन्ही वाटा सोडून अगदी डोंगराच्या माथ्यावरून मेलगिरी लिंगाप्पाच्या देवळामागून रामेश्वराच्या देवळाला जाण्याची नवी टूम विठ्ठलाने काढली.  ह्याचे कारण पावसाळ्यात डोंगरावरची व भोवतालच्या दूरवर मैदानी प्रदेशातील शोभा फार सुंदर दिसत असे.

विठ्ठलाच्या लहानपणीच्या वागण्यात धाडशीपणा आणि अर्कटपणा कधी कधी डोकावत असे.  रामतीर्थ डोंगरावर विषारी काळे विंचू अथवा इंगळ्या भरपूर असत.  ह्या इंगळ्यांनी नांगी मारली की प्राणांतिक वेदना होत असत.  हे विंचू धरून त्यांची लांबलचक माळ करण्याची खोड या मित्रमंडळाला लागली होती.  विठ्ठल विंचू धरण्यात धीट आणि पटाईत होता.  विंचवाच्या नांगीतले विष काढून त्याला अगदी तळहातावर घेऊन इतर मुलांना चकित करीत असे.  विंचू नजरेस पडला तर तो आपली नांगी प्रथम वर करतो.  विठ्ठल मोठ्या शिताफीने ती नांगी चिमटीत घट्ट पकडत असे.  मग नखावर त्याच्या नांगीचे टोक घासले म्हणजे विषाचा एक बिंदू बाहेर निघे.  मग विंचू निस्तेज होऊन आपोआप नांगी खाली टाकी.  मग त्याला हातावर घेण्यात कोणताच धोका नसे.  तरीही इतर मुले हे धाडस दाखवीत नसत.  विठ्ठल मात्र हे धाडस दाखवून हातावर विंचू घेऊन फुशारकी मारीत असे.  घरात किंवा शाळेत विंचू निघाला तर तो पकडण्याचे काम विठ्ठलाचे.  एखादे वेळी गडबडीत विंचू चावला तरी अभिमानास पेटून विठ्ठल त्या वेदना मुकाट्याने सहन करायचा.

दुखणे आले अथवा जबर इजा झाली तरी विठ्ठल विव्हळत नसे.  स्वस्थ घुमेपणाने पडून राही.  ''विठ्या, तू काय बेरड आहेस रे'' असे आई उद्‍गारी.  ही स्पार्टन सहिष्णुता आपल्यात जन्मजात नसून ती मानीपणाने आणल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  शाळेत शिक्षकाकडून छडी खाण्याचा प्रसंग विठ्ठलावर येत नसे.  पण केवळ आपल्या अंगी सहनशीलता बाणावी यासाठी एखाद्या मुलाला आपल्या हातावर जोराने छडी मारावयास तो सांगत असे.  तळहात काळा-निळा झाला तरी त्याच्या तोंडातून हूं की चूं निघत नसे.  या प्रकारची सहनशीलता त्याने आपल्या ठिकाणी जाणीवपूर्वक बाणवली होती.  आपली सहनशीलता अजमावण्यासाठी सहाव्या-सातव्या इयत्तेत असताना विठूने एक भयंकरच प्रकार करून घेतला.  अपण किती वेदना सहन करू शकतो हे अजमावण्यासाठी नेहमीचे मित्रमंडळ बसले असता व्यंकू कुलकर्णीला आपल्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागील भागावर एक जळती उदकाडी ठेऊ दिली.  विठ्ठलाच्या तोंडातून वेदनेचा एखादा शब्दही उमटला नाही, की चेहर्‍यावरून अथवा डोळ्यावरून वेदनेचे कोणतेही चिन्ह दिसले नाही.  उदकाडीच विझू लागली.  विठूच्या आईने इतक्यात अकस्मात येऊन पाहिले.  ती खूप रागे भरली.  त्यांच्या उजव्या हाताच्या मागे लहानसा व्रण अखेरपर्यंत होता.  धाडसाची आणि विक्षिप्‍तपणाची लकेर त्यांच्या पुढच्या आयुष्यातही अनेकदा चमकून जाताना दिसते.  १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना पन्हाळगड, विशाळगडाची सफर त्यांनी केली.  तेव्हा किल्ल्याच्या अवघड जागी चढून जाऊन बसणे त्यांना आवडायचे.  पुढे इंग्लंडला गेल्यावर लेक डिस्ट्रिक्ट्समधील 'लीथ्स कॉटेज' ह्या प्रो. कार्पेंटर यांच्या घरी इतर सहाध्यायांसमवेत ते सुटी घालविण्यासाठी प्रोफेसरांच्या निमंत्रणावरून गेले होते.  सूर्योदय पाहण्यासाठी रात्री उठून डोंगराच्या शिखरावर जावयाचे ठरले होते.  भल्या पहाटे अंधाराच्या वेळी डोंगराची काही वाट चढल्यानंतर पाऊस पडला.  बाकीची सारी मंडळी परतली.  परंतु विठ्ठल रामजी मात्र एकटेच पुढे निघाले. खूप पाऊस आल्यामुळे त्यांना डोंगरातील एका छोट्या गुहेत उजाडेपर्यंत भुतासारखी रात्र काढावी लागली.  ह्याच सुटीमध्ये सगळ्या मंडळींसमवेत ते वनभोजनास गेले असता मंडळी स्वच्छंदपणे हिंडत होती.  एका उंच झाडावर चढण्याची विठ्ठल रामजींना हुक्की आली व ते पायात बूट असताना कसेतरी चढले; परंतु बूट घसरू लागल्यामुळे उतरणे त्यांना जमेना.  मंडळीत बूट कोढणेही अशिष्टपणाचे वाटले.  अखेर एका फांदीच्या वर जाऊन ती वाकवून त्यांनी खाली उडी घेतली त्या वेळी तर मिसेस् कार्पेंटरनी किंकाळीच फोडली.  पुन्हा असला प्रकार करू नकोस म्हणून त्यांनी गंभीरपणाने त्यांना बजावले.  स्कॉटलंडातील सरोवर प्रांतात रोज वीस-पंचवीस मैल चालत जाऊन उंच डोंगराच्या शिखरावर ते एकटेच तासनतास बसत.  रॉवरडेनॉन नावाच्या खेड्यात ते एका गरीब कुटुंबात उतरले होते.  तेथील लहान मुलांना घेऊन ते लॉख लोमंड सरोवरावर एकदा फिरायला गेले.  सरोवरात पोहोण्याची त्यांना लहर आली.  कपडे काढून उडी घेतली.  जरी उन्हाळ, होता तरी सरोवराचे पाणी इतके थंड होते की पाण्यात पडल्याबरोबर ते गारठले.  हातापायांत गोळे येऊ लागले.  मोठ्या प्रयासाने ते काठाला लागले.  लहान मुले घाबरून गेली.  सुदैवाने जिवावरचा हा प्रसंग टळला.

खोडकर स्वभावामुळे जमखंडीस विठ्ठलावर आणि मित्रमंडळावर खोड मोडावी असा एक बिकट प्रसंग आला होता.  शिमग्याच्या दिवसात बाबांचा डोळा चुकवून ही मुले उनाडक्या करीत फिरत असत.  त्याचा अतिरेक म्हणजे वेश्यांच्या आळीत बदफैली लोकांच्या नावाने शिमग्यातल्या अचकट बिचकट म्हणी म्हणत, अभद्र ध्वनी काढीत मध्यरात्र उलटून जाईपर्यंत हिंडत.  एकदा विठ्ठल काही मुलांबरोबर एका वेश्येच्या घराजवळ वाईट गाणी म्हणत, शंखध्वनी करीत गेला व मुलांच्या नादी लागून तिच्या दाराशी दंगामस्ती करू लागला.  आतून बाळा काणे नावाचा एक तरुण ब्राह्मण त्रासून आला व त्याने विठ्ठलालाच पकडले.  याच शिक्षकाने विठूला शाळेत घालण्याचा प्रथम मुहूर्त करण्याचा धडा घालून दिला होता.  हा शिक्षक फार रागीट, दांडगा व शाळेत मुलांना गुरासारखा झोडपणारा होता.  संतापून त्याने विठूचे डोके धरले.  त्याच्या हातात विठूचा रुमाल राहिला व त्याने सुंबाल्या केला.  बाळा काण्यांच्या हातून आपण सुटलो खरे पण रुमालाशिवाय घरात बाबांपुढे कसे जाणार अशी फिकीर त्याला पडली.  शेवटी वडील भाऊ परशुराम काण्यांकडे गेला.  विठू, परशुराम रामजीबुवांचे मुलगे असे कळल्यावर त्याचीच भीतीने गाळण उडाली.  रुमाल परत देऊन झालेली गोष्ट बाबांना कळवू नको अशी विठूच्या भावाचीच तो गयावया करू लागला.  व्यक्तिगत आणि सामुदायिक खोड्यांचे आणि व्रात्यपणाचे कितीतरी प्रकार विठ्ठल रामजींनी केले होते.  ह्या त्यांच्या खोड्यांतून काहीतरी वेगळे करण्याचा धाडशीपणा दिसून येतो, त्याचप्रमाणे त्यांची विलक्षण सहनशीलताही दिसून येते.

एकांत सहली
विठ्ठल पोरवयात सदैव आपल्या मित्रमंडळींसमवेत खेळ करण्यात, धांगडधिंगा घालण्यात वा आडदांडपणाने वागण्यात दंग असला तरी याही वयात एकाकीपणे निसर्गात रममाण होण्याची व स्वतःमध्येच गुंग होऊन जाण्याची त्याची वृत्ती दिसून येत असे.  जमखंडी गावचा परिसर हाही या दृष्टीने आकृष्ट करणारा होता.  जमखंडी गाव तीन डोंगरांच्या कुशीत वसलेला.  दक्षिणेस मुधोळ संस्थानच्या वाटेवर एक लांब सुंदर दरी.  तिच्यात कट्टेगिरी नावाचा एक विस्तीर्ण तलाव आहे.  पावसाळ्यात हा भरून वाहू लागला म्हणजे त्या प्रदेशास सुंदर शोभा प्राप्‍त होत असे.  मग विठूला एखाद्या दरीतून, डोंगराच्या माथ्यावरून आजूबाजूच्या शेतात किंवा जमखंडीतील मोतीबागेतून एकटेच हिंडणे आवडत असे.  आपल्या हृदयाचा परिपोष ह्या एकांत सहलीमुळे विशेष झाला असे त्यांनी नमूद केले आहे.  निर्जन डोंगरातून व दरीतून एकाकीपणे हिंडत असताना तो आपण वाचलेल्या कादंबर्‍यांतील नायकाच्या ठिकाणी स्वतःला कल्पून गुंगून जात असे.  नायिकेशिवाय विप्रलंभ शृंगाराचा अनुभव सृष्टिदेवीच्या आविर्भावात तो घेत असे.  निसर्गाच्या विविध विभ्रमात रंगून जात असे.  मात्र विठ्ठल रामजींनी लिहिले आहे की, ''सर्वांच्याही पूर्वी मला हृदयदान दिले ते माझ्या पवित्र आईनेच !  तिच्याच पुण्यप्रभावाने मला सर्व जडरसांतून तारण मिळून माझ्या हृदयाचा परिपाक प्रथम धर्माच्या भक्तिरसात व नंतर तत्त्वज्ञानाच्या शांत रसात झाला.''३  निसर्गाच्या आवडीची पूर्वतयारी आपल्या आईच्या रानावनाच्या गोड गोष्टींत आणि बाबांच्या प्रेमळ सहवासातच झाली असे त्यांना वाटते.  पुढे कादंबर्‍यांनी आणि पौराणिक पोथ्यांनी जी काही भर टाकली असेल ती केवळ शब्दसंपत्तीची आणि जडरसांचीच होय.  दैवी कोमल भावनांचा पहिला ठसा त्यांच्या आईचाच.

विठ्ठल रामजींच्या निसर्गप्रेमाचा परिपोष व्हावयाला दुसरे कारण म्हणजे त्यांच्या वडिलांची वनभोजनाची आवड.  जमखंडी गावाच्या पश्चिमेस सातशे-आठशे फूट उंच असलेल्या डोंगराच्या शिखरावर मेलगिरी लिंगाप्पा या नावाने ओळखले जाणारे एक शिवालय आहे.  पावसाळ्यात हा उंच डोंगर हिरवागार होतो.  हे उंच आणि एकांत ठिकाण रामजीबाबानां पसंत असे.  वर्षातून निदान एकदा तरी - विशेषतः पावसाळ्याच्या अखेरीस - रामजीबाबा आपल्या सर्व कुटुंबीयांना व एकदोघा जिवलग मित्रांना बरोबर घेऊन वनभोजनासाठी त्या ठिकाणी जात.  रामजीबाबांची ही रसिकता विठ्ठलाच्या मनाला त्या वयातच उत्कटत्वाने भावली.  त्यामुळे सृष्टिशोभेची आवड व अवलोकनशक्तीची बीजे लहानपणीच विठ्ठलाच्या ग्रहणशील मनामध्ये रुजली.

वाचन
व्यक्तिमत्त्वाच्या घडणीच्या काळात मनाचे पोषण करणारा एक घटक म्हणजे वाचन होय.  विठ्ठल रामजींच्या ठिकाणी कल्पनाशीलता व वृत्तीची भावनामयता असल्यामुळे निव्वळ शालेय अभ्यासक्रमानेसुद्धा त्यांच्या मनावर कोणते संस्कार केले हे आपण बघितले.  शालेय अभ्यासक्रमाबाहेरच्या अवांतर वाचनामुळे त्यांच्या मनाचे पोषण होणे स्वाभाविक होते.  कल्पनाशीलता आणि भावनामयता या त्यांच्या वृत्तिविशेषांमुळे कादंबरीसारख्या अद्‍भुतरम्य वाङ्‌मयप्रकाराकडे त्यांचे मन आकृष्ट होणे स्वाभाविक होते.  १८८०-८५ पर्यंतचा काळच असा होता की, त्या वेळेला सकस वास्तवदर्शी कादंबरीवाङ्‌मयाची निर्मिती व्हावयाला प्रारंभदेखील झाला नव्हता.  अद्‍भुतरम्य कथानकाच्या आणि उघड शृंगाराच्या कादंबर्‍यांची पैदास मात्र विपुल प्रमाणात होत होती.  अगदी लहानपणापासूनच त्यांना गोष्टी ऐकण्याचा छंद होता.  मग स्वतः वाचण्याच्या अवस्थेप्रत आल्यानंतर त्यांचा मोहरा कादंबरीसारख्या कल्पनानिर्मित वाङ्‌मयाकडे वळणे स्वाभाविकच होते.  मराठी चौथा-पाचव्या इयत्तेत असताना गुलबकावली, वेताळपंचविशी, बत्तीसपुतळी, शुकबहात्तरी वगैरे पुस्तके त्यांनी वाचली.  इंग्रजी शाळेत गेल्यानंतर खालच्या वर्गात असतानाच विचित्रपुरी, मंजुघोषा, मदनमंजिरी, वसंतकोकिला, शृंगारसुंदरी ही पुस्तके कोठूनतरी मिळवून अधाशाप्रमाणे वाचून टाकली.  पुढे पुढे सहाव्या-सातव्या इयत्तेत गेल्यानंतर अरेबियन नाइट्सचे भाषांतर, नारायणराव व गोदावरी, वेषधारी पंजाबी अशा प्रकारची पुस्तके मिळवून वाचली. मराठी शाळेतील बीभत्स गोष्टी आणि इंग्रजी शाळेतील शृंगाराच्या घवघवीत वर्णनाच्या कादंबर्‍या यांमुळे आपल्यात अकाली शृंगाररसाचा प्रादुर्भाव होण्याचा अनिष्ट परिणाम झाला असे त्यांना वाटले, तरी एकंदरीतच करुण, शृंगार, वीर, रौद्र इत्यादी रसही समजू लागून त्यांच्या बुद्धीचा, त्याप्रमाणेच हृदयाचा परिपोश होणे हे स्वाभाविक होते.  त्यांच्या हायस्कूल शिक्षणाच्या काळातच जमखंडीस अल्लर्डुर्रर्र नाटके येऊ लागली.  वरच्या इयत्तेत गेल्यावर वाईकर संगीत मंडळीचे रत्‍नावली आणि अण्णा किर्लोस्करांची शाकुंतल आणि सौभद्र ही नाटके पाहावयास मिळू लागली.  गरिबीमुळे नाटके पाहण्यावर मर्यादा पडत असली तरी त्यांच्या कादंबरीवाचनाला पायबंद बसण्याचे कारण नव्हते.  सातत्याने अखेरपर्यंत पहिला नंबर टिकविल्यामुळे त्यांचे कादंबरीवाचनाचे वेड कुणाच्या डोळ्यांवर आले नाही.  आपले खाजगी वाचन केवळ फोलकट कादंबर्‍यांतच न संपता श्रीधर, मुक्तेश्वर, महिपतीसारख्या मराठी कवींच्या पौराणिक पोथ्याही वाचीत असू हे त्यांनी नमूद केले आहे.  त्यांच्या बाबांच्या संग्रही हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, करवीरमाहात्म्य, गुरुचरित्र वगैरे पोथ्या असत.  त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीची एक मोठी हस्तलिखित पोथी आणि तुकारामाची रूपावली, मनचर्येचे अभंग, गौळण वगैरे हस्तलिखित गाथांचा संग्रह असे.  त्याशिवाय त्यांच्या बाबांनी दत्त संप्रदायाची अष्टके, देवींच्या आरत्या, अनुभविक साधूंची पदे, भजने, भारूडे वगैरे कानडी आणि मराठी पदांचा त्यांना जसजसा शोध लागे त्याप्रमाणे ते मुलांकडून लिहून ठेवीत असत.  ह्यामुळे विठ्ठल रामजींच्या धर्मबुद्धीच्या विकासालाच नव्हे तर मराठी व कानडी भाषेच्या अभ्यासाला मोठी मदत झाली.

बालपणातील धर्मभावना
१८९१ अखेरचा म्हणजे वयाची अठरा वर्षे होईपर्यंतचा काळ हा विठ्ठल रामजींच्या हायस्कूल शिक्षणाचा कालखंड होय.  अभ्यास, खेळ, खोड्या, वाचन वगैरेंबद्दलच्या त्यांनी जशा आठवणी लिहिल्या आहेत, त्याचप्रमाणे स्वतःच्या धर्मभावनेबद्दलच्या आठवणीही लिहिल्या आहेत.  विठ्ठल रामजींनी पुढे ऑक्सफर्ड येथे तौलानिक धर्मशास्त्राचा अभ्यास केला.  मानववंशशास्त्र, समाजशास्त्र ह्यांची अभ्यासपद्धती आत्मसात केली आणि धर्मभावना हा तर त्यांच्या चरित्राचा आत्मा.  तेव्हा बालपणापासूनच्या स्वतःच्या धर्मभावनेचे त्यांनी आकलन-निवेदन करणे अपरिहार्यच होते.  हे निवेदन करताना त्यांची दृष्टी शास्त्रीय स्वरूपाची, धर्मविषयक त्यांचा विचारही पारंपारिक रूढ धर्मनिष्ठेहून वेगळा होता.  इतर गोष्टी वेगळ्या व धर्म ही बाब वेगळी अशी त्यांची समजूत नाही.  इतर गोष्टींप्रमाणे मनुष्यमात्रात धर्माची जी उपजत बुद्धी आढळते तीही परिणतीचा व विकासाचा विषय आहे असे त्यांना वाटते.  त्यांच्या वैचारिकतेत उत्क्रांतीच्या अथवा क्रमवार विकासाच्या तत्त्वाला महत्त्वाचे स्थान आहे.  खाणे, पिणे, वाचन, अभ्यास वगैरे गोष्टी जशा निसर्गनियमाप्रमाणे घडतात, त्यांना ईश्वरी प्रसादाची किंवा प्रेरणेची गरज नसते त्याचप्रमाणे धर्माच्या जागृतीला आणि वाढीलाही ईश्वरी कृत्याची जरुरी नाही असे त्यांचे मत.  ह्या जाणिवेतूनच त्यांनी आपल्या बालपणीतील धर्मभावनेचे स्मरण, आकलन व निवेदन केले आहे.  धर्म हा विषय बुद्धीपेक्षा भावनेचा अधिक आहे आणि तो विकासशीलही आहे, ही त्यांची भूमिका असल्याने धर्मविषयक आठवणीला त्यांनी अगदी पाळण्यापासून सुरुवात केली.  आदिमानवापासून ते आजच्या सुधारलेल्या मानवापर्यंत धर्मविषयक कल्पनेत जसा एक विकासक्रम दिसतो तसाच मानवी व्यक्तीच्या जीवनातही बालपणापासून त्याच्या प्रौढावस्थेपर्यंत असू शकतो.  हा धर्मविषयक कल्पनेच्या विकासक्रमात असलेला समांतरपणा विठ्ठल रामजींच्या भूमिकेमध्ये दिसून येतो. धर्मविषयक जाणिवेचा प्रारंभ पाळण्यातल्या एका स्पष्ट आठवणीपासून ते करतात.  लहानगा विठू पाळण्यात उताणा असताना त्याचे लक्ष वर असलेल्या एका वेळूच्या चमत्कारिक गाठीकडे जात असे.  ही गाठ त्याला दाढीवाल्या बोवाच्या मुखवट्याप्रमाणे भासत असे.  तो लवकर निजला नाही तर आणि निजवायची घाई असली म्हणजे आई त्याला बागुलबुवाची भीती घालायची.  ही वेळूची गाठ म्हणजेच बागुलबुवा अशी भीती आणि आश्चर्य या भावनांनी मिसळलेली समजूत त्याच्या कोवळ्या मनाची व्हावयाची व गाठीत दिसणार्‍या बोवाची आणि त्याची दृष्टादृष्ट झाली म्हणजे त्याचा लय त्याच्याकडे विशेषच लागे आणि त्याचे रडणे थांबे.  ह्या वेळी लहानग्या विठूचे वय फार तर सव्वादोन-अडीच वर्षांचे असेल.  त्याच्या धर्मशावनेचा हा पहिला आविष्कार.  हे बागुलबुवाचे त्याला झालेले दर्शन म्हणजे त्याच्या पहिल्या देवाचे दर्शन होय असा अर्थ प्रगल्भावस्थेतील विठ्ठल रामजींना विश्लेषणाअंती जाणवला.

त्यांच्या घरी लहानपणी आजोबा तुळजापूरच्या अंबाबाईची भक्ती करीत, तर आजी यल्लमा देवीची.  लहानग्या विठूला यल्लमा अधिक पसंत असे.  कारण तिचा गाजावाजा जास्त आणि पूजेत गोड खावयालाही भरपूर मिळत असे.

आजी जिवंत असेपर्यंत बाबांनी पुढे सुरू केलेल्या ब्राह्मणी संस्कृतीला विशेष बळ आले नव्हते.  देव्हार्‍यावरच्या श्रीयल्लमापेक्षाही बाहेरच्या गोठ्यातील कोनाड्यात बसलेल्या ताईबाईंचे प्रस्थ वर्षातून एक दिवस इतके माजे की सर्वजण हैराण होऊन जात.  कारण एक आजोबांचा अपवाद वगळता सर्वजण शाकाहारी असत आणि केवळ नवसासाठी म्हणून एक गाभण मेंढी कापून या ग्राम्य ताईबाईची आजीला कंदुरी करावी लागत असे.  यल्लमाचा लहानग्या विठूच्या मनावर अनुकूल परिणाम होत असे तर ताईबाईचा अतिशय प्रतिकूल.  हा राग एवढा असे की, महाद्वाराशी दोन्ही बाजूला ठेवलेल्या व हळदीकुंकवाने पुजल्या जाणार्‍या दोन दोन त्रिकोनी दगडाला ताईबाईचे नातलग समजून लहानगा विठू चांगले ठेचून काढीत असे, उलटे ठेवी किंवा पालथे पाडी.  जिवंत मेंढी कापल्याचा राग लहानगा विठू ताईबाईच्या ह्या आरोपित नातलगांवर काढीत असे.

घरामध्ये कितीतरी आरोपित देवतांची पूजा लहानग्या विठूला करावी लागत असे.  एका खोलीतील पडका खांब म्हणजे रमाबाई नावाच्या एका बाईंचे भूत असे.  महापूजेचा प्रसंग आला म्हणजे देव्हार्‍यावरील खंडोगणती टाकांची व मूर्तींची पूजा झाल्यावर, उतरंडीच्या डेर्‍यांची, लाकडी पादुकांची, खिडकीतून रचून ठेवलेल्या पोथ्यांची, स्वयंपाकघरातील ताक करण्यासाठी रोवलेल्या खांबाची, सोप्यातील गणपतीची, गोठ्यातील ताईबाईची आणि पायखान्याजवळील बाहेरच्या पडक्या खोलीतील खांबाची ऊर्फ रमाबाई नावाच्या भुताची पूजा लहानग्या विठूला क्रमवार करावी लागत असे आणि गोड नैवेद्याच्या अपेक्षेने ही सर्व पूजा यथासांग करणे त्याला आवडतही असे.

चौथ्या-पाचव्या इयत्तेत असताना विठूकडेच घरचे पुजारीपण बाबांनी दिले होते.  मूर्तिपूजा करण्यात त्याचे मन रमत असले तरी सकाळची शाळा आटोपून आल्यानंतर स्नान करून जेवण वगैरे न करता घरची पूजा आटोपून भर उन्हात मारुतीच्या देवळात पूजा करण्याला जावयाचे त्याच्या जिवावर येई.  घरच्या पासरीभर देवांचा त्याला कधी कधी राग येत असे.  घाईघाईने तो दूरवरून देव्हार्‍यातल्या टाकावर पाणी फेकून भिजवीत असे.  घरच्या देवांचा असा संक्षिप्‍त समाचार घेतल्यावर मारुतीच्या पूजेसाठीही त्याने पर्याय शोधून काढला.  घरातून निघताना पंचपात्री, गंध, फुले, अक्षता असा थाट करून निघाला तरी कडाक्याची भूक लागलेली असताना मारुतीच्या देवळापर्यंत तो जातो कशाला ?  अंगणाच्या पलीकडेच त्याच्या बाबांचे मित्र म्हातारबा सुतार यांचा सुतारकामाचा नेट असे.  त्यांच्याकडे दुरुस्तीला आलेल्या गाड्यांपैकी एखाद्या गाडीच्या चाकाच्या गड्डयाची पूजा करून हा तत्परतेने घरी उपस्थित असे.  आपल्या गाडीच्या चाकाची पूजा कशी होते ह्या गूढाबद्दल म्हातारबाने विठूच्या बाबांकडेच चौकशी केली असता हे रहस्य उलगडले.  विठूने आपली लबाडी प्रामाणिकपणे कबूल केली.  त्याच बाबांनी त्याच्या जेवणाला उशीर होतो हे ध्यानात घेऊन आणि त्याच्या खरे बोलण्याचे कौतुक करून मारुतीची पूजा करण्याच्या कामातून त्याची सुटकी केली.  बाबांनी पूजेची त्याच्यावर बळजबरी न केल्याने मूर्तिपूजेबाबतच्या विठूच्या धर्मबुद्धीला धक्का पोहोचला नाही.

वयाच्या बाराव्या वर्षापर्यंतची विठूची देवपूजेबाबतची समजूत आणि वागणूक अशा प्रकारची होती.  त्यानंतर मात्र मूर्तिपूजेच्या बाबतीत त्याच्या ठिकाणी मनःपूर्वकता आणि उत्साह अधिकाधिक निर्माण होऊ लागला.  त्याच्या देवघरातील देव्हारा म्हणजे कमरेइतक्या उंचीवर असलेला चार फूट रुंद, उंच आणि खोल कोनाडा होता.  त्यात देवाच्या मूर्ती, पितराचे टाक, शाळिग्राम, निरनिराळ्या नद्यातले गोटे ह्या पूजनीय वस्तू असत आणि घंटा, धूपारती, निरांजने, पळीपंचपात्र, शंख इत्यादी पूजेची उपकरणे असत.  मनात आले की विठू ह्या सर्व देवदेवता आणि उपकरणे धुऊन-पुसून व्यवस्थेने मांडून त्यावर गंधाक्षता, कुंकू, हळद, फुले यथासांग लावून पूजा करीत असे.  अशी पूजा करण्यात त्याला मोठे सुख वाटत असे.  सणावारी गोडधोड नैवेद्याचे असले म्हणजे त्याच्या बालभक्तीला पूर येत असे.  मात्र हीही गोष्ट खरी की, ही पूजा करण्यात केवळ नैवेद्याचा लोभ होता असे नव्हे.  बाबांनी पूजेची सक्ती त्यावर केली नव्हती.  तेव्हा त्या लहान वयामध्ये आपल्या ठिकाणी एक प्रकारची कोवळी आध्यात्मिकताच असण्याची शक्यता विठ्ठल रामजींना जाणवली.

इंग्रजी तिसर्‍या-चौथ्या इयत्तेत असताना वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी आपल्या भावनाशील अंतःकरणात स्पष्टरूपाने भक्तिभावनेचा उद्रेक झाल्याचे विठ्ठल रामजींना जाणवले.  एव्हाना त्याचे पौराणिक पोथ्यांचे वाचन झाले होते.  शिवलीलामृत ह्या पोथीचे पारायण स्नानानंतर जेवणापूर्वी आवडीने करीत असे.  श्रावण मासात शिवलिंगाचे अर्चन मोठ्या भक्तिभावाने करू लागला.  स्वहस्ते तोडून आणलेली बेलपत्रे पाटावर ठेवलेल्या शिवलिंगाला भक्तिभावाने अर्पण करीत असे.  शिव आणि विष्णू ह्या दोन मुख्य देवतांपैकी शिवाची भक्ती करणे त्याला अधिक पसंत असे.  शिवालये प्राचीन आणि निवांत असतात.  विष्णूच्या मंदिराप्रमाणे भजन-पूजनाचा व स्त्री-पुरुषांचा गोंगाट तेथे नसतो.  हरिचरित्रातील कृष्णाचे जे चाळे त्याने वाचले होते त्यापेक्षा शंकरपार्वतीच्या गोष्टींतील साधेपणा व भोळेपणा त्याच्या मनाला अधिक भावत असे.
हायस्कूलच्या शेवटच्या दोन-चार वर्षांत विठ्ठलाच्या बुद्धिविकासाबरोबरच भक्तीची भावना अधिक विकसित झाली.  शाळकरी विठ्ठल आपल्या सोबत्यांत जमवून सुट्टीच्या दिवसांत हरिविजयातील गोवर्धनाख्यान, रामविजयातील कुंभकर्णवध किंवा पांडवप्रतापातील हरिश्चंद्राख्यान असले भक्तिरसोत्पादक अध्याय वाचून पुराणिकांप्रमाणे अर्थ सांगत असे.  हरिश्चंद्राख्यान तर हा छोटा पुराणिक इतके समरसून सांगत असे की, तो आणि त्याचे श्रोते करुणरसाने व्याकूळ होऊन रडत असत.  बाबा वाचीत असलेल्या गुरुचरित्रातील कथा करुणभक्तीचा परिपोष करणार्‍या जाणवून विशेष आवडू लागल्या.  विठूच्या बुद्धिविकासाबरोबरच धर्मभावनांचाही विकास होऊ लागला.  श्रावण मासात डोंगरात आपल्या मित्र वानरसेनेला घेऊन जाऊन परत येताना जिवंत विंचवाची माळ घरी आणून लहान बहिणींना भेडसावणार्‍या आडदांड विठूमध्ये आता एकदम फरक पडला होता.  श्रावण महिन्यात स्नान करून जेवणापूर्वी शिवलीलामृताचे पारायण करण्याचा, नामजपाचा आणि उपवास करून दीड मैल दूरवरच्या डोंगरावरील रामतीर्थास जाऊन येण्याचा जो नाद त्याला लागला त्यात त्याच्या अंतःकरणाचा खरा भक्तिभाव होता.  विठूमध्ये पडलेला हा फरक पाहून त्याच्या प्रेमळ आईबाबांना कौतुक वाटत असे.  विठूच्या वृत्तीमध्ये झालेला हा फरक आकस्मिक नव्हता.  त्याच्या भावाचा मृत्यू, घरातील दारिद्र्य, आईबाबांचा उदासीनपणा इत्यादी नैसर्गिक कारणे या आंतरपालटाची होती.  वर्गातील हुशारीमुळे सोबत्यांमध्ये आणि वर्गामध्ये जे यश व पुढारपण मिळाले त्याचाही हा सात्त्विक परिणाम होता.
विठ्ठल शाळेत जाण्यापूर्वी मूर्तीचे दर्शन घेत असे.  बबलादीच्या सिद्ध पुरुषाने दिलेला प्रसाद आणि रामेश्वराचा, मारुतीचा, दत्ताचा वगैरे अंगारा तो पेटीत घालून ठेवीत असे व शाळेला जाण्यापूर्वी हा मिश्र अंगारा कपाळाला लावीत असे.  आपल्या भक्तीमुळे वर्गात इतरांपेक्षा जास्त मार्क मिळून पहिला नंबर राही अशी त्याची भावना होती.  त्यात धर्मभोळेपणा होता.  पाचव्या इयत्तेत खरूज झाल्यामुळे त्यानेच यल्लमाच्या यात्रेला जाण्याचा आग्रह धरला व त्याच्या बाबांनी तो पारही पाडला.  विठ्ठलाच्या भक्तिभावनेच्या विकासातील ह्या दुसर्‍या टप्प्यात सकामतेचा अंश असला तरी तिच्यात बर्‍याच अंशाने स्वाभाविक सहजमधुरता होती.
विठ्ठलाच्या भक्तिभावनेचा ह्या वयातील आणखी एक आविष्कार म्हणजे संतसमागमामुळे त्याला होणारा आनंद.  ह्या आनंदाचे स्वरूप अर्थातच धार्मिक होते.  रामजीबाबांना संसारी आपत्तीच्या ह्या काळात साधुसंतांचा नाद लागलेला होता व ते त्यांची यथायोग्य संभावना करीत असत.  विठ्ठलालाही अशा साधुसंतांचा समाचार घेणे आवडत असे.  जुन्या धर्माचे अनेक आचार त्याच्या घरी चालत असले तरी केवळ कर्मठपणा, धर्मभोळेपणा, दंभ आणि दुराग्रहाचा पगडा त्याच्या आईबापांच्या वर्तनात कधीच दिसून येत नसे.  कोणा सांप्रदायिक अतिथिचा दांभिकपणा अथवा स्वार्थी मतलब दिसून आला तर रामजीबाबा उग्र रूप धारण करून त्याची उलट्या दिशेने संभावना केल्याशिवाय राहत नसत.  आईबाबांच्या धर्मभावना साध्या, सहज आणि निर्हेतुक होत्या.  त्यामध्येच आपल्या भावी धर्माचा आणि सामाजिक सुधारणांचा उगम असल्याचे त्यांना जाणवले.
कौटुंबिक वातावरण
विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले आयुष्य उदार, उन्नत अशा धर्मप्रसारासाठी घालवावयाचे असा ऐन तारुण्यात निश्चय केला व ब्राह्मधर्माचे प्रचारक म्हणून आपले आयुष्य वेचले, हे सर्वश्रुत आहे.  अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे धर्मकार्य समजून ह्या कामासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले.  मुरळी सोडण्याची विघातक चाल बंद व्हावी, मुलांप्रमाणे मुलींनाही सक्तीचे शिक्षण मिळावे, शेतकर्‍यांची स्थिती सुधारावी यांसारख्या सुधारणा घडून याव्यात यासाठी त्यांनी तळमळीने आयुष्यभर प्रयत्‍न केले असे दिसून येते.  धार्मिक सामाजिक सुधारणेसाठी आपले आयुष्य वाहून, फकिरी पत्करून एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर कार्य केले हे उदाहरण एक विठ्ठल रामजी सोडता निदान अन्य कुणाही मराठी माणसाचे दिसून येत नाही.  विठ्ठल रामजींच्या हातून भावी आयुष्यात जे अपवादात्मक वाटावे असे मौलिक स्वरूपाचे कार्य घडले त्याची तयारी त्यांच्या कौटुंबिक वातावरणातच झाली होती.  त्यालाही त्यांच्या आईबाबांचा धर्म आणि शील हीच कारणीभूत होती.
विठ्ठलाच्या आजोबा-आजींची पुरातन देवदेवींच्या उपासनेची परंपरा त्याच्या आई-वडिलांनी चालविली.  मात्र त्यांच्या पाठीमागे ती टिकून राहण्याचा प्रश्नच नव्हता.  कारण आई-वडील हयात असतानाच रामजीबाबांनी पंढरपूरच्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला होता.  एवढेच नव्हे तर पुढाकारही चालू केला होता.  विठ्ठलाच्या थोरल्या भावाचे नाव परशुराम असे ठेवले होते.  ते यल्लमाची भक्ती करणार्‍या आजीने ठेवले असावे, कारण यल्लमा हे जमदग्नी ॠषीची पत्‍नी रेणुकादेवी हिचे तेलगू अथवा कानडी नाव होय.  पुढील सर्व मुलांची नावे रामजीबाबांनी पंढरपूरच्या वारकरी संप्रदायानुसार ठेवलेली आढळतात.  विठूच्या जन्माच्या वेळी रामजीबाबा पंढरीच्या वारीला गेले होते.  विठूचे पाळण्यात ठेवलेले नाव तुकाराम असे असले तरी वारीवरून आल्यानंतर त्यांनी बदलून विठ्ठल असे ठेवले.  विठ्ठल पाचवा मुलगा.  जनाक्का हे सातवे अपत्य, आठवी तान्याक्का.  हिचे नाव मुक्ताबाई असे ठेवले.  शेवटच्या मुलाचे नाव एकनाथ.  वारकरी पंथाच्या साध्या, उदार, भागवत धर्माचा प्रभाव रामजीबाबांच्या मनावर, त्यांच्या शीलावर पडलेला होता.
आपली भावी सामाजिक सुधारणा बाबांच्या भागवत धर्मातून उदय पावली असे विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटते.
"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥
ह्या तुकाराममहाराजांच्या अभंगाचा ठसा बाबांनी व आईने विठूच्या ग्रहणशील हृदयावर आपल्या प्रत्यक्ष आणि पदोपदीच्या प्रेमळ आचरणाने उठविला.  त्यामध्ये ब्राह्मसमाजाचे ते प्रचारक झाल्यानंतरही विशेष भर पडली असे त्यांना वाटत नाही.  प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजाचा मराठ्यांवरच नव्हे तर इतरही महाराष्ट्रीयांवर फारसा परिणाम झालेला नसताना विठ्ठल रामजी मात्र त्याचे आजीव प्रचारक झाले.  ह्याचे श्रेय समाजापेक्षाही त्यांच्या वडिलांनी घालून दिलेल्या आचरणाच्या धड्याकडेच जास्त जाते.
त्यांच्या घरात पडदानशीनपणा नव्हता की सोवळेपणा राखून जातिभेदाला थारा देणे त्यांना माहीत नव्हते.  कोणीही सभ्य. विश्वासार्ह पाहुणेमंडळी अगर मित्रमंडळी आली तर घरची स्त्रीपुरुष आणि लहानथोर माणसे मोकळेपणाने वागत असत.  घरच्या स्वाभाविक बाळबोधपणामुळे व स्नेहशील गोड वागणुकीमुळे बाहेरच्यांना त्यांच्या घरातल्या सर्वांचे वर्तन नमुनेदान वाटत असे.  त्यांच्या घरातील शांती, तृप्‍ती आणि प्रीती अवर्णनीय वाटत असे.  त्यांचे बाबा आपल्या मुलींना 'आई' अशी हाक मारीत.  ही लहानशी गोष्ट बाहेरच्यांच्या अंतःकरणाला भिडत असे.  विठूच्या दोन लहान बहिणी त्याच्या लहानग्या मित्रांबरोबर लडिवाळपणाने व मोकळपणाने वागत.  आई विठूच्या सार्‍या मित्रांना आपल्याच मुलांप्रमाणे वागवावयाची.  विश्वकुटुंबी वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या घरातील वातावरणामुळे बाहेरच्यांना सहज होत असे.  आपल्या घरासंबंधी लिहिताना विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, ''नुसता पडदा न घालणे ह्यात काही विशेष नाही; पण अंतःकरणातच मुळी पडद्याला थारा र देणे ही दैवी कृपा होय.  आमचे घर म्हणजे ह्या दैवी कृपेचा देव्हारा होता !  प्रापंचिक विपत्ती कितीही आल्या; दारिद्र्य, आजार, मरण, कर्जाचा बोजा असले इतर कितीही मनाची पारख करणारे प्रसंग आले, तरी घरचे शांतीचे वातावरण कधी क्षुब्ध होत नसे.  येणेप्रमणे भौतिक दारिद्र्यात आत्मिक श्रीमंतीचा भोग आमचे घरी आणि घरातील लहानथोर व्यक्तींत दिसत असे.  अशा घरी मग जातिभेदाला कोठून वाव मिळणार !  आधुनिक सुधारकाप्रमाणे जातिभेद मोडण्याची उठाठेव करण्याची आम्हांवर कधी पाळीच येत नसे.  कारण तो जातिभेदाचा संस्कारच आम्हांवर घडला नव्हता.''४
शिक्षणाच्या बाबतीत रामजीबाबांच्या घराचा त्या प्रांतात मोठा लौकिक होता.  त्यांनी त्या काळाच्या मानाने घेतलेले पुस्तकी शिक्षण व संपादिलेली बहुश्रुतता लोक नावाजीत असत.  विठ्ठलाने हायस्कूलच्या अभ्यासामध्ये जी प्रगती दाखविली त्याचे अप्रत्यक्ष श्रेय त्यांच्या वडिलांना.  परंतु रामजीबाबांची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण देण्यास उत्साह दाखविला होता.  ही त्या काळाच्या मानाने व मराठा समाजाच्या बाबतीत अपवादात्मक गोष्ट म्हणावी लागेल.  ह्यावरून स्पष्ट दिसते की, मुलगा आणि मुलगी यांमध्ये ते फरक करीत नव्हते. भगिनी जनाबाईंनी लिहिलेल्या आठवणीत तर असे नमूद केले आहे की, जमखंडी येथे मुलींसाठी स्वतंत्र शाळा व्हावी, याचा प्रारंभिक प्रयत्‍न रामजीबाबांनीच केला व संस्थानाच्या अधिपतीचे पाठबळ मिळून जमखंडीस मुलींची शाळा स्थापन झाली.
घरच्या ह्या मोकळ्या वातावरणामध्ये विठूच्या स्वभावविशेषांचा विकास स्वाभाविकपणे होत राहिला.  स्वातंत्र्याची आवड, नव्या जीवनाची स्पृहा आणि सत्याचा छडा लावण्याची हौस ही विठ्ठल रामजींच्या स्वभावाची मुख्य लक्षणे लहानपणापासूनच दिसून येत होती.  ह्या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याच्या आविष्काराला आळा घालण्याचा प्रयत्‍न विठूच्या लहानपणी आईबाबांनी कधी केला नाही, आईबाबांचा त्याला आश्रय होता, पण दाब कसलाही नव्हता. त्याने एखादी चांगली पण अगदी नवी आणि रूढीविरुद्ध गोष्ट केली तर तिचे ते कौतुकच करायला तयार असत.
हायस्कूल शिक्षणाच्या काळात विठूला निरनिराळ्या जातींचे व संस्कृतीचे मित्र आणि सोबती मिळत जाऊन त्याला आपल्या विचाराला आचाराचे स्वरूप देण्याचे प्रयोग करण्यालाही वाव मिळू लागला.  ब्राह्मण-लिंगायतांसारख्या ज्या जाती मराठ्यांकडे जेवत नाहीत त्या जातीची माणसे त्यांच्या विश्वकुटुंबी घरी जेवत.  न्हावी, धोबी वगैरे तसेच मुसलमानांसारख्या परधर्मीयांकडे मराठे जेवत नसत.  त्या जातींच्या लोकांशीही त्यांच्या घरी पंक्तिभेद कधी घडत नसे.  विठ्ठलाचे वय चौदा-पंधरा वर्षांचे असताना सय्यद मीरासाहेब हथरूट या पोक्त मुसलमान गृहस्थाचा त्याच्याशी जिवलग स्नेह जडला.  मीरासाहेब त्यांच्या घरी आणि विठ्ठल मीरासाहेबांच्या घरी उघड जेवत असत. त्याच्यासमोर या मुसलमान कुटुंबातील स्त्रिया पडदा पाळीत नसत.  एवढी समरसता ह्या दोन कुटुंबांत त्या वेळेलाच झाली होती.
शिंदे यांच्या कुटुंबातील सुधारकी वर्तणुकीचा विशेष म्हणजे, समता आणि स्वतंत्रता, उदारता आणि स्वाभिमान ह्यांचा समतोल स्वाभाविकपणे पाहिला जात असे.  पोकळ डौल सोडून समानतेच्या नात्याने वागणार्‍या ब्राह्मण-लिंगायतादी जातींतील व्यक्तींशी आणि मुसलमानांसारख्या परधर्मीय मित्रांशी समानतेचे, स्वतंत्रतेचे, अंतःकरणापासून प्रेमाचे नाते असले तरच हा भोजनादी व्यवहार एकत्र होत असे.  अंतःकरणाचा जिव्हाळा, हेतूचा शुद्धपणा आणि अकृत्रिम प्रेम हा सर्व सुधारणांचा अढळ पाया असतो.  देवाणघेवाणीच्या व्यापारी तत्त्वाने अथवा आधुनिक सुधारकाच्या शुद्ध बुद्धिवादाने खर्‍याखुर्‍या सुधारणा घडत नसतात अशी विठ्ठल रामजींची जी धारणा पुढील काळात प्रकट होत राहिली त्याचा वस्तुपाठ त्यांना बालपणीच घरच्या घरी गिरवावयास मिळाला.
भावी काळात त्यांच्या हातून सामाजिक सुधारणेचे कार्य घडावे अशी त्यांच्या मनाची घडण बालपणीच त्यांच्या घरातील संस्कारांनी झाली.  आपण प्रार्थनासमाजात गेलो म्हणून सुधारक झालो असे नसून, आपण सुधारक होतो म्हणून प्रार्थनासमाजात गेलो असे विठ्ठल रामजींनी रास्तपणे नमूद केले आहे.

संदर्भ
१.  विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ.४४.
२.  तत्रैव, पृ. ४५-४६.
३.  तत्रैव, पृ. ६४.
४.  तत्रेव, पृ. ८२.