1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व प्रगती पत्रातील अहवाल

दिनांक १३ रोजी रात्री राजाराम कॉलेज हॉलमध्ये श्रीयुत विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे सुरस व सुबोध मराठीत हरिकीर्तन झाले. ता. १४ रोजी सकाळी राजाराम कॉलेज हॉलमध्ये भाई प्रथमलाल सेन ह्यांनी हिंदीत उपासना चालविली. ता. १५ रोजी सायंकाळी प्रेमदास बुवा ह्यांचे नगर संकीर्तन झाले. रात्री ८-३० वाजता राजाराम कॉलेज हॉलमध्ये रा. ब. डॉ. खेडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली प्रो. वासवानी ह्यांचे “ब्राह्मसमाज आणि राष्ट्र घटना” ह्या विषयावर विस्तृत विवेचनपूर्ण, सुबोध, सुविचारपरिपूर्ण आणि अस्खलित दीड तासपर्यंत व्याख्यान झाले. ता. १६ रोजी संध्याकाळी येथील जगदगुरू श्री. शंकराचार्य स्वामी ह्यांचे संस्थानी रा. शिंदे ह्यांचे हरीकीर्तन झाले. श्री. स्वामी महाराजांनी कीर्तन समाप्तीनंतर रा. शिंदे ह्यांना रेशमी उपरणे व प्रसाद अर्पण करून ब्राह्मसमाज धर्माची मूलतत्त्वे आपणांस मान्य आहेत असे सर्वांस विदित केले. ह्याप्रमाणे ब्राह्म मंडळीने करवीरस्थांस ब्राह्मधर्माची व्याख्यानाद्वारे, कीर्तनाद्वारे आणि भजनाद्वारे ओळख करून दिली. सदर मंडळीने इकडे येऊन ब्राह्मधर्माच्या तत्त्वाविषयी इकडे जागृती उत्पन्न केली आहे. इतकेच नाही तर सर्व हिंदू लोकांना पूज्य व पवित्र असे जे शंकराचार्यांचे पीठ, त्यावरील सांप्रत विराजमान पुरूषानेही आपली उघड पसंती दर्शवून सदर ब्राह्ममंडळीचे आपल्या पवित्र मठात त्यांचे कीर्तन करवून अभिनंदन केले आहे. ह्यावरून वारा कसा वाहत आहे व सत्यधर्माचाच कसा विजय होत आहे हे दिसून येईल.

श्रींस तरूणबुवांचे कीर्तन पसंत पडले. श्री. जगदगुरू ह्यांनी रा. रा. शिंदे ह्यांस आपणाजवळ बोलावून जवळ बसवून घेतले व म्हणाले की, “तुमच्या प्रकृतीस विकृती झाली असून तिकडे लक्ष न देता फार सुरस कीर्तन केलेत. आम्हांस फार संतोष वाटला. तुम्ही जे प्रतिपादन केलेत ते यथार्थ आहे. तुमची मते आम्हांस पसंत वाटतात. तुम्ही हाती घेतलेले कार्य पवित्र असून तुम्ही सत्यधर्माचा लोकांत प्रसार करीत आहात” हे श्री. जगदगुरूंचे भाषण ऐकून रा. शिंदे म्हणाले की, “धर्मसंबंधी सुधारणा स्वामी महाराजांच्या पीठावरून अधिकाराने झाल्या असता त्या सहज लोकांस पटणार आहेत. स्वामी महाराजांनी त्या अवश्य कराव्यात. अशी माझी विनंती आहे. मद्रासकडे व महाराष्ट्रातील पुष्कळ कनिष्ठ जातींचे लोक ख्रिस्तीधर्मात जातात व त्यामुळे हिंदुधर्माची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ह्याकरिता श्री. जगदगुरूंनी अशा लोकांची इच्छा असेल तर त्यांस परत हिंदुधर्मात येण्याची मोकळीक देण्याविषयीचे आज्ञापत्र प्रसिद्ध करावे.” रा. शिंदे ह्यांची ही विनंती ऐकून श्री. जगदगुरूंस त्यांचे म्हणणे रास्त आहे असे वाटले व त्यांनी असे स्पष्ट बोलून दाखविले की, ही व अशा सुधारणा लवकरच घडवून आणण्याचा श्रींचा मानस आहे. परधर्मात गेलेले आपले लोक परत आपल्या धर्मात घेण्याविषयी परवानगीचे आज्ञापत्र काढण्याविषयी श्रींचा विचार चालू आहे आणि श्रींनी असेही बोलून दाखविले की, योग्य त्या धर्मसंबंधाच्या सुधारणा आपल्या कारकीर्दीत घडून याव्यात व रा. शिंदे ह्यांच्यासारख्या लोकांचा आपणांस नित्य समागम घडावा अशी आपली फार इच्छा आहे.

कोल्हापूरच्या प्रगतीकरांनी आपल्या एका लेखात पुढील उत्तेजक उदगार काढले आहेत:-

“ह्या मंडळीस आमची अशी विनंती आहे की, त्यांनी जागोजाग प्रवास करून हे धर्म प्रसाराचे पवित्र कार्य सारखे चालू ठेवावे. मुंबईस, कराचीस अथवा पुण्यास एके ठिकाणी राहून हे धर्म प्रसाराचे कार्य होणार नाही. नेहमी प्रवास करणे अत्यंत इष्ट आहे. सांप्रत जो शिक्षणाचा प्रसार ह्या देशात झाला आहे, त्यामुळे लोकमत जागृत झाले आहे. पण राजकीय, सामाजिक व औद्योगिक बाबतीत जशी काम करणारी मंडळी पुढे येत आहेत, तशी धर्मसंबंधी बाबींत काम करणारी रा. शिंदे प्रभृतीसारखी मंडळी पुढे येईल तर ब्राह्मधर्माचा अथवा प्रार्थनासमाजाच्या धर्माचा प्रसार अधिकाधिक होत जाईल”.

कै. डॉ. संतूजी रामजी लाड

श्री. गणपतराव वामनराव खराटे यांस,
स.न.वि.वि.

आपले तारीख नसलेले पत्र आजच पोचले. प. लो. वा. डॉ. संतूजी रामजी लाड ह्यांचे चरित्र आपण प्रसिद्ध करणार हे वाचून फारच आनंद झाला. ते धनगर समाजासाठी प्रसिद्ध करणार असाल तर मराठीतच करणार असाल म्हणून मी हे आज मराठीतच देत आहे. माफी असावी.

मला स्वत:ला फार माहिती नाही. ते महात्मा जोतिबा फुले ह्यांचे शिष्य व अभिमानी होते. माझे मोठे मित्र होते. मजवर फार ममता करीत होते. मी त्यांना वडिलाप्रमाणे मान देत होतो. इ. स. १९०६ साली मी जेव्हा Depressed Classes Mission Society of India (अखिल भारतीय निराश्रित (अस्पृश्य) साह्यकारी मंडळी) मुंबई  येथे प्रथम काढली तेव्हा प्रथमचे पाच संस्थापक सभासद होते, त्यात डॉ. लाड हे एक होते. परळ येथे ह्या मंडळीच्या शाळा  वगैरे इतर संस्था होत्या. त्यात गरीबासाठी एक मोफत दवाखाना होता. तो डॉ. लाड हे काहीएक वेतन न घेता चालवीत असत. ठाण्याहून ते रोज परळ येथे केव्हा केव्हा अधिक वेळा आपल्या खर्चाने येत असत. फार प्रेमाने हरिजनाला शिवून औषधोपचार करीत असत. अगदी मरेपर्यंत ही सेवा त्यांनी मनोभावाने केली. ते मुंबई प्रार्थना समाजाचे एक फार जुने सभासद होते. कोणत्याही प्रकारे जातिभेद पाळीत नसत. वरील मंडळीच्या समारंभात सहभोजने होत असत. त्यात ते जुन्याकाळी उघडपणे भाग घेत असत. ठाणे शहरी ह्या मिशनच्या जाहीर सभा करीत व प्रार्थना समाजाच्या सभासदांस, उपासनेस, जेवणास वरचेवर आपल्या घरी बोलावीत असत. ठाण्याला एक रात्रीची शाळाही त्यांनी चालविली होती. आपल्या घरी निराश्रित ठेवले होते. ही सर्व सेवा करीत असता त्यांनी माझेविषयी इतकी कळकळ व तळमळ दाखविली की ती आठवण झाली की, माझे डोळ्यातून अश्रू गळतात. जी सेवा केली तिचा त्यांनी कधीच गाजावाजा केला नाही. की, कसल्याही मोबदल्याची आशा ठेविली नाही. महात्मा जोतिबाचे शिष्य व प्रार्थनासमाजाचे मासलेवाईक सभासद होते. त्यांच्यात आळस नव्हता किंवा अहंकार नव्हता. त्यांना ऐकू येत नव्हते. तरी ते आमच्या सर्व सभांना हजर राहून अंगमेहनतीची कामे आनंदाने करीत. दवाखान्यातूनच कामे करून न राहता अगदी गलिच्छ मोहल्यातून जातीने हिंडून समाचार घेत असत. हे कार्यही उदारपणे करीत. असे करीत होते म्हणून या मंडळीच्या शाखा सर्व देशभर पसरून महात्मा गांधीसारख्या मोठ्या पुरूषाचे लक्ष पुढे लागून ह्या कार्यास आता सर्वमान्य राष्ट्रीय स्वरूप आले आहे.

पंढरीनाथ पाटील ह्या व-हाडातील गृहस्थाने जोतिबा फुलेंचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात काही माहिती आढळेल. ठाणे येथील प्रसिद्ध वकील श्री केशवराव पाध्ये बी. ए. एल एल बी. ह्यांना डॉ. लाडांची बरीच माहिती असावी. त्यानंतर भेसराव सो. लोखंडे (ते स्वर्गवासी होऊन आता बरेच दिवस झाले) त्यांनी गिरणी कामगारासाठी मुंबईत गेल्या शतकात मोठी कामगिरी केली म्हणून लाड सांगत होते. त्यात लाड साहेबांचे साहाय्य असावे. स्त्रीशिक्षणाचे काम त्यांनी केले. त्यांच्या एका मुलीला इंग्रजी शिकविले.

मी हल्ली वृद्ध व आजारी आहे. वातकंपाने दोन्ही हात हालतात. पत्रे लिहवत नाहीत. मला जास्त माहिती नाही पण व्यवहार वाढवू नये. लो. अ. ही. वि. क्षमा असावी, यश लाभो.

आपला नम्र
वि. रा. शिंदे

कै. अण्णासाहेब शिंदे चरित्र व कार्य

पुण्यानगरीस ललामभूत असलेले एक सन्माननीय नागरिक श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांना तारीख २ रोजी अर्धांगाच्या विकाराने देवाज्ञा झाली. कै. शिंदे यांचा जन्म १८७३ मध्ये झाला बालपण जमखंडी संस्थानात गेल्यामुळे तेथील हायस्कुलातच मॅट्रिकपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. कै. अण्णासाहेब हे जात्याच बुद्धिमान असल्याने त्यांनी शिष्यवृत्तीच्या जोरावरच फर्ग्युसन कॉलेजातील उच्च शिक्षणाची पायरी गाठून ते पूर्ण केले. व पुढे वकिली करण्याच्या उद्देशाने एल एल. बी. चा अभ्यास चालविला. फर्स्ट एल एल. बी. ची परीक्षा झाल्यावर त्यांचा ओढा प्रार्थना समाजाकडे वळला व ते त्या संस्थेचे एक प्रचारकही झाले. पुढे याच कार्यासाठी ‘युनिटेरियन’ शिष्यवृत्ती त्यांना मिळाली व १९०१ साली ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात तुलनात्मक कार्याचे अध्ययन करण्यासाठी ते तिकडे गेले. ऑक्सफर्ड येथे जाण्याच्या अगोदर त्यांनी लोकमान्यांची भेट घेऊन त्यांस आपला बेतही कळविला होता. लोकमान्यांनी त्यांना कसे प्रोत्साहन दिले ही गोष्ट कै. अण्णासाहेबांनी आपल्या आठवणीत दिली आहे. श्री. सदाशिवराव बापट यांनी संपादित केलेल्या आठवणीच्या द्वितीय खंडात कै. अण्णासाहेब यांनी दिलेल्या या आठवणी प्रसिद्ध झाल्या आहेत. (पृ. २००) त्यांत राष्ट्रीय वृत्तीत मुरलेले कै. शिंदे व लोकमान्य यांचे मन एकमेकासंबंधी व परस्पर कार्यासंबंधी कसे होते याची साक्ष उत्कटत्वाने नजरेस येते. १९०३ साली लिव्हरपूल येथे भरलेल्या त्रैवार्षिक युनिटेरियन परिषदेस ते हजर होते. त्यावेळी त्यांनी ‘लिबरल रिलिजन इन इंडिया-’ हा प्रबंध तेथे वाचला होता. तेथून परत आल्यावर प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी त्याने आसेतु हिमाचल प्रवास केला व १९०६ साली ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ ची स्थापना करून आपले सामाजिक ऋण फेडले. याच कामाची धुरा वहात असताना ते भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाचे काही काल चिटणीस होते. त्यांचा राष्ट्रीय चळवळीकडेही विशेष ओढा असल्यामुळे त्यांनी १९३० साली राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला व त्यात ६ महिन्यांची त्यांना कारावासाची शिक्षा झाली होती. अलीकडे ब-याच वर्षांपासून त्यांना अर्धांगाचा विकार जडल्यामुळे त्यांनी मिशनचे कामही हातावेगळे करून ते दुस-याकडे सोपविले होते. कै. शिंदे यांनी आपले जीवनध्येय कोणत्या रीतीने आचरणात आणले हे त्यांनी लिहिलेल्या स्वत:च्या चरित्रावरून सहज लक्षात येईल. कै. शिंदे यांचा भाषा शास्त्राचा अभ्यास चांगलाच होता. अस्पृश्य समाजाच्या उन्नत्तीसाठी त्यांना अहर्निश चिंता असल्याने त्यांनी आपले विचार प्रसिद्ध केले आहेत. कै. शिंदे यांच्या निधनाने महाराष्ट्र समाजाची मोटी हानी झाली ही गोष्ट कोणासही नाकबूल करता यावयाची नाही. याची उत्तम साक्ष त्यांच्या पार्थिव देहास अग्नी देताना जी भाषणे झाली, त्यावरून प्रत्ययास येईल. कै. शिंदे यांच्या निधनाने पुण्यपत्तनातील एक थोर पुरूष नाहीसा झाला.

कालियामर्दन

पुराणातील ही कथा शुकाने परिक्षित राजाला सांगितलेली आहे. पुराणे चांगली का वाईट हाच वाद सध्या माजून राहिलेला आहे. एक पक्ष म्हणतो, पुराणामध्ये पावणे सोळा आणे गाबाळ आहे व पाव आणा ग्राह्यांश आहे. दुसरा पक्ष म्हणतो, पुराणे सोळा आणे बरोबर आहेत. पण कोणी असे सांगत नाही की पुराणामध्ये वाईट गोष्टी आहेत, चांगल्याही आहेत. चांगले असेल  ते घ्या, वाईट असेल ते टाकून द्या. यःकश्चित क्षुद्र पदार्थदेखील तिखटमीठ लावून रसभरित करता येतो मग पुराणामध्ये गोडी नाही असे कसे म्हणावे ? पुराणांनी सुधारणा सोपी केलेली आहे, मात्र त्यामधील चोथा टाकून देऊन रस घेतला पाहिजे. ‘कालियामर्दन’ ही पुराणातीलच गोष्ट आहे.

श्रीकृष्ण हा आपल्या सोबत्यांबरोबर यमुनातीरी खेळत असता त्याने बळेच तो चेंडू यमुनेच्या तिरावरील कळंबाचे झाडावर उडविला. त्या झाडावरून तो काढण्याकरिता त्याने आपल्या सोबत्यांना बोलाविले. त्यांपैकी काही त्याच्याबरोबर गेले व काही मागच्या मागे पळाले, पण कोणाच्याने त्या झाडावर चढण्यास धीर होईना, एवढेच नव्हे तर श्रीकृष्ण जेव्हा झाडावर चढू लागला तेव्हा त्यांनी त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणू लागले-
नेणो म्हणती हे करितोसि काई । आम्हा तुझी आई देईल शिव्या ।।
आपुलिया काना ठेवूनिया हात । सकळी निमित्त टाळियेले ।।
निमित्ता कारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ।।
खांदीवरी पाव ठेवियला देवे । पाडाव त्या भावे चेंडु तळी ।।
तळीला नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव जाणो नेदी ।।

आपल्या बुद्धीला जे योग्य वाटले ते श्रीकृष्णाला करावयाचे होते, म्हणून कोणाची पर्वा न करिता तो झाडावर चढला व मुद्दामच त्याने तो चेंडू यमुनेच्या डोहात पाडला व तो काढण्याकरिता त्याने आत उडी घेतली. तेव्हा सर्वत्र फार हाहाःकार झाला. गोपांनी ही बातमी नगरात जाऊन सांगितली, तेव्हा सर्व गोप, गौळणी वगैरे नदीकिनारी येऊन, अहाहा, उहूंहूं, अगाई करून रडू लागले. श्रीकृष्ण कधी मरणार नाही म्हणून बलरामाने त्यांचे खाली लिहिल्याप्रमाणे समाधान केले-
बळ तयासि म्हणे तुम्ही आयका । सकळ गोवळ गौळणि बायका ।।
भय कदापि न या व्रजनायका । असुख कोण करी सुखदायका ।।
अशा रामशद्वासि घेऊन कानी । यशोदादि संपूर्ण त्या गोपिकांनी ।।
दिले प्राण नाही तया बायकांही । गमे धैर्य त्या रामवाक्येचि काही ।।

हा बळरामाचा उपदेश ऐकून रडे बंद करून सर्वजण घरी गेले. श्रीकृष्णाला त्यांची ही भावना कळून चुकली. तो पाण्याच्या आतही गेला नव्हता व बाहेरही नव्हता, पण आडून कोण कसा रडतो हे पाहत होता. आईबाप, भाऊबंद तटाजवळच येऊन तटस्थ होत असतात, त्याच्या पलीकडे जाण्याचे कोणाला सामर्थ्य होत नाही. स्वबचावाकरिता जो तो सावध असतो. कृष्णाचा जीव धोक्यात आहे असे त्यांना वाटत असूनही त्याला सोडविण्यास कोणी तयार झाला नाही.

दूर देखोनिया यमुनेचे जळ । काठीच कल्होळ करिताती ।।
मागे सरे माय पाऊला पाउली । आपलेच घाली धाके अंग ।।
अंग राखोनिया माय खेद करी । अंतरीचे हरी जाणवले ।।
जाणवले मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ।।

जो मनुष्य काळाची पर्वा न करता सुधारणा करू इच्छितो, त्याने कृष्णाप्रमाणेच कोणाची वाट न पहाता आपल्याच बलावर सुधारणा केली पाहिजे. म्हणजे त्याला काळ म्हणजे कःपदार्थ आहे असे कळून येईल. त्या कामी मदत करण्यास तर कोणी तयार नसतात, पण उलट त्याच्या मार्गामध्ये विघ्ने उत्पन्न करणारे बरेच असतात, पण खरे सुधारक आपल्या मताप्रमाणेच वागून आपल्या बुद्धीचे समाधान करीत असतात. काळावर नजर देऊन स्वस्थ न बसता काळ म्हणजे कःपदार्थ आहे हे श्रीकृष्णाने कालियाचे म्हणजे काळाचे मर्दन करून स्पष्टपणे लोकांचे दृष्टोपत्तीस आणून दिले. अशा रीतीने ख-या सुधारकाचे लक्षण श्रीकृष्णामध्ये किती पूर्णपणे दिसून येत होते आणि त्याने आपल्या बालक्रीडेमध्ये ते वेळोवेळी कसे दाखविले हे वरील कथेत स्पष्ट दिसून येते. डोहातून वर आल्यावरही कोणावर न रागावता कृष्णाने सर्वांना आलिंगन दिले.

कवित्व आणि भरारी

आमचे मित्र रा. विठ्ठल रामजी शिंदे यांची कवित्वाच्या जोरावर भरा-या मारण्याची शैली विलक्षण आहे ह्यात संशय नाही. एका काळी ......फार दिवसापूर्वी नव्हे....... हे जातवार प्रतिनिधीच्या विरूद्ध होते. आता अंत्यजासाठी काही विवक्षित जागा कायदे काउनसिलात राकून ठेवाव्या अशा प्रकारची त्यांची फ्रांचोइज कमिटीपुढे साक्ष झाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हे त्यांचे खाजगी मत असल्याचे समजते. त्यांनी आजपर्यंत ब्राह्मणांनी व ब्राह्मणेतरांनी सलोख्याने वागण्याबद्दल अनेक ठिकाणी उपदेश केलेला असून थोडे दिवसापूर्वी ब्राह्मणेतरांनी ब्राह्मण जर आपल्या स्वातंत्र्याच्या आड येतील तर त्यांचा सशस्त्र प्रतिकार करावा, मात्र प्रेमाने त्यांची डोकी फोडावी अशा अर्थाचे भाषण केल्याचेही प्रसिद्ध झाले आहे. ह्या त्यांच्या भाषणाने ब्राह्मणद्वेष्ट्या काही वृत्तपत्रांना आनंद झाला असून श्री. शिंदे माहेरी आल्याबद्दल त्यांचा शाब्दिक उत्सव सुरू आहे. मि. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना आम्ही पूर्णपणे ओळखीत असल्यामुळे त्यांच्या वर निर्दिष्ट केलेल्या भाषणचा हेतू काय असावा ह्या विषयी आम्हाला संशय नाही. परंतु सर्वच जणांना त्यांनी उत्साहाच्या जोरात केलेल्या भाषणाचा अर्थ समजण्याइतकी त्यांच्याविषयी माहिती असणे शक्य नाही. रा. शिंदे ह्यांनी अंत्यजोद्धाराचे हाती घेतलेले कार्य इतके मोठे आहे की, त्यांनी त्या व्यतिरिक्त अन्य उठाठेवीत पडणे म्हणजे आपली कार्यक्षमता कमी करून घेणे होय. आमच्या सूचनेच रा. शिंदे अव्हेर करणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे.

  1. ईश्वर आणि विश्वास
  2. इतिहास संशोधन व भाषाशास्त्र
  3. इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक चळवळ आणि लिव्हरपूल
  4. आवड आणि प्रीती
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
  • 33
  • 34
Page 30 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी