1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

आयुष्यांतील परिवर्तनें

माझ्या आयुष्याचें साकल्येंकरून निरीक्षण केल्यास त्यांत खालील चमत्कारिक योगायोग येऊन प्रत्येक दहा वर्षांनीं एक निश्चित परिवर्तन घडून आल्याचें दिसून येत आहे.  मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला नाहीं.  पण निश्चितकालीं झालेलीं हीं परिवर्तनें पाहून त्यांच्या मुळाशीं कांहीं ग्रहलाघव बाहे असा एखादा ज्योतिषशास्त्रज्ञ सांगूं शकेल.  माझ्या जन्मकाळींच म्हणजे ता. २३ एप्रिल १८७३ रोजीं आमच्या गृहपुरोहिताने माझी सशास्त्र जन्मपत्रिका वर्तवली.  ती मी खालीं जशीच्या तशीच देत आहें.

जन्मपत्रिका  :-  स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १७९५ प्रवर्तमाने श्रीमुखनाम संवत्सरे ॥  चैत्र वद्य ११ बुधवार घटी १५ पळ १ शततारानक्षत्र घटी ० पळ ५८ ॥  ब्रह्मनामयोग घटी ९ पळ ४८ नराकर्ण घटी १५ पळ २८ एवं पंचांगशुध्दौ ॥ अस्मिन् शुभदिवसे रामबसप्पा तस्य भार्या कुंकुमोक्तसौभाग्यवती यमुनाबाई तृतीय (पंचम संतानं अथवा चतुर्थ पुत्रः V. R. Shinde) मजीजतन् ॥  अवकहडाचक्रानुसारेण जननकाल घटी सूयौदयानंतर १४ घटिका प्रसूतकालाः ॥  पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रथम चरण ॥  जन्मनामशंक्रप्पाइति ॥  शेशिगिरीइतिप्रतिष्टितं ॥  कुंभराशीमहानक्षत्रमुखं पतति ।  उत्तमं ।  मुखेअन्नसुखंचैवशीर्षोराजंश्चमेवच ।  मनुष्यगण ।  हारणी जाति ॥  आजायोनी ॥ जन्मकालेशिंहलग्न ॥  जनकाले गुरू महर्दश ॥ ..... जन्मापासून सोळा वर्षापर्यंत सर्व गोष्टी उत्तम प्रकार होईल ॥  १२, १७, २१, ३२, ४२, ४३ येतेषुशुभगृहावलोकिते ॥  आयुष्य ८० ॥  मातापितृसेवकः ॥  विद्यावंतः ॥  बहुजनप्रियः ॥  देवब्राह्मणद्विजपूजिकः ॥  श्रीमंगलमाहेश्वरी शुभं भवतु । तदेव लग्नं ॥  शुभमस्तु ॥  कल्याणमस्तु ॥

जन्मकुंडली (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

वरील अशुद्ध लेखनावरून पुरोहितबुवा फारसे मोठे भाषापंडित होते असें दिसत नाहीं.  त्यांचें ज्योतिषशास्त्रपांडित्य किती होतें हें सांगण्याचा मला अधिकार नाहीं.  कुंडलीमध्येंही कांहीं दोषस्थळें आहेत असें माझ्या तज्ज्ञ मित्रांनीं सांगितलें.  फलश्रुतीच ताडून पहावयाची तर वर जीं माझ्या आयुष्यांतलीं वर्षे शुभग्रहाचीं म्हणून सांगितलीं आहेत त्यांचा मला तरी तसा अनुभव आला नाहीं.  कांहीं वर्षे तर मला उलट अनुभव आला आहे.  तें कसेंही असो.  माझ्या आयुष्यांत निश्चितपणें प्रत्येक १० वे वर्षी जीं ठळक स्थित्यंतरें आढळून आलीं त्यांवरून पुढील परिवर्तनकाल मीं ठरविला आहे.  तो असा :-

ता. २३ एप्रिल १८७३ जन्मकाल

परिवर्तन १ लें  :-  १८८२-८३ माझा विवाह.  वडिलोपार्जित घर गहाण ठेवून विवाहाप्रीत्यर्थ कर्ज.  त्यापायीं सर्व मिळकत जाऊन भयंकर दारिद्र्यप्राप्‍ति.  वडील बंधूचा मृत्यु.  प्राथमिक शिक्षण संपलें.

परिवर्तन २ रें  :-  १८९२-९३ दुय्यम शिक्षण संपलें.  पहिली नोकरी सुटली.  कॉलेजशिक्षणार्थ पुण्यास आलों.  

परिवर्तन ३ रें  :-  १९०३ विलायतेंतील शिक्षण संपवून मुंबईस परत आलों.  सार्वजनिक सेवेची सुरुवात.

परिवर्तन ४ थें  :-  १९१२-१४ अंतर्बाह्य खळबळ, प्रार्थनासमाजाचा संबंध सुटला.  भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचें पहिल्या सहा वर्षांचें अर्धे तप संपलें.  मुंबई शहरची वस्ती सोडून पुणें शाखेची व्यवस्था प्रत्यक्ष ताब्यांत घेतली.  मग त्यासाठीं पुण्यास येऊन राहिलों.

परिवर्तन ५ वें  :-  १९२३-२४ निराश्रित साह्यकारी मंडळीचा (डी. सी. मिशनच्या प्रत्यक्ष चालकत्वाचा) संबंध सुटला.  कलकत्त्यास गेलों.  ब्राह्मसमाजाचा पुन्हां प्रचारक झालों.  हिंदुस्थानच्या नैर्ॠत्य किनार्‍यावरील मंगळूर येथील ब्राह्मसमाजाचा आचार्य झालों.  

परिवर्तन ६ वें  :-  १९३३-३४ राममोहन रॉय शतसांवत्सरिक तिथीप्रीत्यर्थ महाराष्ट्रांत व बृहन्महाराष्ट्रांत थेट नागपूरपर्यंत जिल्हा-जिल्ह्यांतून व कांहीं तालुक्यांतूनही व्याख्यानांचा मोठा दौरा काढला.  शीण इतका आला कीं मधुमेहाची तीव्र व्यथा झालेली आढळली.  हल्लीं वार्धक्य आणि आजार यांच्या ताब्यांत गेलों आहें.  

परिवर्तन ७ वें  :-  १९४३ ह्या सालीं किंवा त्या अगोदर काय होणार हें अस्पष्ट दिसतच आहे.

वरील जीं परिवर्तनें झालीं त्यांत स्थानांतर आणि स्थित्यंतर हीं मुख्य लक्षणें होतीं.  

१९०९-१० सालीं जी अंतर्बाह्य खळबळ म्हणून वर्णन केलें आहे, ती १९१२-१३ चें जें ४ थें परिवर्तन घडलें त्याची पूर्वतयारी होती.  आई-बाप वारले, योगक्षेमाचें साधन नाहींसें झालें, घरांतील मंडळी रोगग्रस्त झाली, मी फार कंटाळून गेलों; तरीदेखील आणखी दोन वर्षे मिशनच्या कामासाठीं मुंबईंतच काढावीं लागलीं.  मुंबई आणि पुणें येथें मिशनला स्वतःच्या इमारतींची फार जरुरी भासूं लागली.  पण पुरेशी स्वतःची जागा मुंबईसारख्या दाट शहरांत मिशनला मिळणें अशक्य होतें.  सरकारलाच स्वतःच्या कचेर्‍यांसाठीं जागा मिळेना.  मुंबई शहरांतील लंबरेषेंत वस्ती पसरूं लागली.  मग आमच्या गरीब मिशनची दाद कोण घेणार ?  मुंबई शहराचा अवाढव्य खर्चिकपणाही मिशनला नडूं लागला.  ह्या कामासाठीं महाराष्ट्राची राजधानी आणि चळवळीचें केंद्र पुणें शहर ह्याकडे मला नजर वळवावी लागली.  याच वेळीं पुणें शाखेंत एक अचानक कारण घडलें.

ए. के. मुदलियार  :  ह्या शाखेचे सन्मान्य सेक्रेटरी रा. ए. के. मुदलियार ह्यांनीं पहिलीं ६ वर्षे अत्यंत जोमानें आणि दक्षतेनें कांहीं एक वेतन न घेतां बाजू संभाळली होती.  त्यांची पत्‍नी सौ. सीताबाई ही एकाएकीं निवर्तल्यामुळें मुदलियार यांवर मोठी आपत्ति आली.  त्यांना घरीं कोणीच जोडीदार नव्हता.  ते पुणें येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्यें शिक्षक होते.  कांहीं कारणानें ती जागाही सुटली.  मुदलियार यांच्या कामांत त्यांच्या पत्‍नीची मोठी मदत होती.  यापुढें श्री. मुदलियार यांना मिशनच्या कामाचा राजिनामा देणें भाग पडलें आणि ऑगस्ट १९१२ मध्यें पुणें शाखेचा ठराव होऊन मीं जरूर ती तजवीज करावी व ती होईतोंपर्यंत मीं स्वतः पुण्यास राहून कामाचा सर्व ताबा घ्यावा असें तांतडीचें पत्र आलें.  मी तेथें गेल्यावर असें आढळून आलें कीं, मुंबईप्रमाणें पुण्याला एक वसतिगृह असावें आणि त्यासाठीं मिशनला स्वतःची इमारत असावी.  ही सर्व परिस्थिति जनतेपुढें ठेवून एक मोठी परिषद भरवून जनताजनार्दनापुढें एक जाहीर विनंती ठेवावी.  ऑक्टोबर महिन्यांत जी महाराष्ट्रीय परिषद भरली तिचें सविस्तर वर्णन मागें आलेंच आहे.

कार्यवाहकांची फेरव्यवस्था  :   निराश्रित सेवासदन बंद पडल्यावर त्यांत तयार झालेले प्रचारक-भगिनी जनाबाई-यांची दुसर्‍या कामावर रवानगी झाली.  वर्‍हाडची आणि मध्यप्रांताची परिस्थिति अजमावून पाहण्याकरितां जनाबाई तिकडे गेल्या आणि यवतमाळ येथें लहानसें वसतिगृह काढून तें चालवूं लागल्या.  हुबळी येथें याच वेळीं कर्नाटक शाखा उघडण्यांत येऊन तिचें चालकत्व रा. सय्यद अबदुल कादर यांस देण्यांत आलें.  त्यांत त्यांची पत्‍नी कल्याणीबाई यांचें पूर्ण साहाय्य मिळालें.  इकडे मुंबईला मध्यवर्ती मातृसंस्थेस रा. वामनराव सोहोनी हे नवीन वाहून घेतलेले कार्यवाहक मिळाले.  भगिनी जनाबाई आणि सय्यद अबदुल कादर यांचें उदाहरण पाहून रा. सोहनींना आत्मसमर्पणाची प्रेरणा (१९१० चे सुमारास) झाली होती.  दोन वर्षे त्यांनीं कामही केलें आणि पूर्ण व स्वतंत्र जबाबदारीची तयारी केली.  याच सालीं औद्योगिक शिक्षणाप्रीत्यर्थ वाडिया ट्रस्टीची दरसाल ६००० रु. ची ग्रँट मिळून मुंबई येथील वसतिगृहांत ४० मुलांची खाण्यापिण्याची वगैरे आणि शाळांतील मुलांची सर्वतोंपरी सोय झाली.  ह्या सर्व कामाचें केन्द्रस्थान परळ येथील पोयबावडीचे नाक्यासमोर घडियाळी हॉल नांवाचा एक प्रशस्त जुना बंगला होता, तेथें करण्यांत आली.  बंगला दोन मजली असून भोंवतालीं उपगृहें आणि समोर उंच वृक्षांची विस्तीर्ण बाग आणि त्याभोंवती उंच तटबंदी होती.  इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या मेहेरबानीनें हा बंगला अगदीं सवलतीच्या भाड्यांनें मिळाला.  मिशनच्या दंडकाप्रमाणें रा. सोहोनी हे आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन मुंबई शाखेचे कुलगुय म्हणून वरील आश्रमांत कायमचे येऊन राहिले.  ते लवकरच ह्या कामाशीं इतके समरस झाले कीं, मध्यवर्ती कामाची माझी सर्व काळजी दूर झाली आणि मी १९१३ च्या आरंभीं पुणें शाखेच्या पुनर्घटनेसाठीं पुण्यास सहकुटुंब येऊन राहिलों.  त्या शाखेचे हेडमास्तर रा. दा. ना. पटवर्धन ह्यांनीं महाराष्ट्र परिषदेची जुळवाजुळव करण्याचे कामीं फार दक्षता दाखवली.  त्यांच्या साहाय्यानें मीं ह्या शाखेचा, माझें जनरल सेक्रेटरीचें काम संभाळून, ताबा घेतला.  येथें माझ्या आयुष्यांतलें चौथें परिवर्तन आणि मिशनच्या ६ वर्षांचें पहिलें अर्धे तप संपलें !

आमचीं लग्नें

तीन लग्नें  :   माझा भाऊ, मी आणि माझी धाकटी बहीण ह्या तीन भावंडांची लग्नें एकाच वेळीं जमखंडींत बाबांनीं केलीं.  बहुतकरून हीं लग्नें कोल्हापूरच्या यात्रेनंतर इ.स.१८८२ च्या सुमारास मे महिन्यांत (वैशाखांत) झालीं असावीं.  सालाची खात्री नाहीं.  १८८२ हें साल नक्की असेल तर माझें वय त्या वेळीं ९ वर्षांचें, भाऊचें १४ वर्षांचें आणि बहिणीचें ४ वर्षांचें होतें.  हीं लग्नें करण्यांत बाबांचा फार अव्यवहारीपणा व अविचार दिसतो.  माझ्या भावाचें वय फार तर शोभण्यासारखें होतें; पण माझें वय व माझ्या बहिणीचें वय अगदींच अक्षम्य होतें.  वधूची पारख म्हणावी तर माझ्या भावाची वधू फार तर ५-६ वर्षांची होती.  ती जमखंडींतील नातलगांची होती.  माझी वधू माझ्या आत्या अंबाबाई हिची सर्वांत धाकटी मुलगी.  ही पुरी एक वर्षाची तरी होती कीं नव्हती ह्याची शंकाच आहे.  आई तर म्हणत होती कीं, ती सहा महिन्यांची होती.  लग्नाचे वेळीं तिला नीट बसतांहि येत नव्हतें.  तीन लग्नें एका वेळीं करूं नयेत अशी आमच्या आईची समजूत होती.  पण तिचें कोण ऐकतो ?  मला आपली मुलगी द्यावी असा माझ्या आत्येचा आग्रह होता.  मी तिचा फार लाडका होतों.  माझा वडील भाऊ १३-१४ वर्षांचा झाला म्हणून त्या वेळचे समजुतीप्रमाणें तो लग्नाला योग्य झाला होता.  तशांत आमच्या घरांत बर्‍याच वर्षांत लग्नकार्य होण्याचा प्रसंग आला नव्हता.  त्या वेळीं जरी आमच्या घराण्याला पूर्ण दारिद्र्य आलें नव्हतें, तरी कर्ज काढल्याशिवाय लग्न होणें शक्य नव्हतें.  लग्नाचे वेळीं घरांतील जे कांहीं दागिने उरले होते, तेही पण गहाण ठेवणें शक्य नव्हतें.  म्हणून बाबांनीं आमचा वाडा गहाण ठेवून प्रथम कर्ज काढलें.  तें चिंतोपंत भिडे ह्या नांवाच्या त्यांच्या एका मित्राकडून अस्सल मुद्दल ५०० रुपयांचें होतें.  धान्य वगैरे घरचें असावें.

सालंकृत कन्यादान  :   ह्या तिन्ही लग्नांचा खर्च बाबांच्याच अंगावर पडला.  कारण माझ्या भावाचा सासरा हा गरीबच होता.  माझा सासरा रामजी माने हा दुष्काळांत आमचेकडेच होता.  तेव्हां हीं दोन्हीं लग्नें आमच्याच खर्चानें करावीं लागलीं.  माझ्या बहिणीचें सालंकृत कन्यादान केलें.  तिचें सासरचें घराणें आसंगीचें चांगलें खाऊनपिऊन सुखी होतें, तरी सर्व खर्च बाबांनीं कर्ज काढून केला.  यावरून आमचे बाबांचे जवळ जरी स्वतःची फारशी माया उरली नव्हती, तरी त्यांची पत बरी होती म्हणावयाची.  आसंगीचे व्याही गोपाळबाबा कामते नांवाचे सभय गृहस्थ आणि समजूतदार रयत होते.  पण वराला लिहितांवाचतां येत नव्हतें.  सुखवस्तु बापाचा तो एकुलता एक लाडका मुलगा होता.  त्याचें वय माझ्याचइतकें म्हणजे ८-९ वर्षांचे होतें.  नांव कृष्णराव होतें.  गोपाळरावांची बायको द्वारकाबाई ही स्वभावानें खाष्ट व मत्सरी होती.  या लग्नाचे वेळीं माझे आईचे पायाला नारू होऊन ती फार आजारी होती.  मुख्य वरमाई अशी आजारी, घरीं दुसरें कोणी कर्ते वडील माणूस नाहीं.  अशा वेळीं हीं लग्नें बाबांनीं कर्ज काढून उभारलीं !  ब्राह्मणाला दक्षिणा देऊन मुहूर्त व लग्नपत्रिका वर्तविली असेल.  पण यांपैकीं एकही स्थळ माझ्या आईला मान्य नव्हतें.

व्याह्यांचा धिंगाणा  :  लग्नसमारंभांत आईची हेळसांड झाली.  आमच्या बाहेरच्या विस्तीर्ण अंगणांत मोठा मांडव घातला होता.  अर्थात् याच मांडवांत माझ्या बहिणीचें लग्न लोकरीतीप्रमाणें आमचे घरीं झालें.  पण माझ्या आत्येची घरची गरिबी फार म्हणून माझेंही लग्न याच मांडवांत झालें आणि तीन लग्नें एकाच मांडवांत करूं नयेत म्हणून माझ्या भावाचें लग्न मात्र त्याच्या सासर्‍याच्या घरीं झालें.  पण जेवणाखाण्याचा सर्व खर्च बाबांचा.  खर्च आमचा पण देखरेखीला आमचेकडचें कोणी नसल्यामुळें एकंदर लग्नसमारंभांत चार दिवस एकसारखी अंदाधुंदी चालली होती.  मी लहानपणीं फार खेळकर होतों.  हळदी लागल्यावर नवर्‍या मुलानें बाहेर जाऊं नये, असें असतां मी लग्नाचे वेळीं तळ्यावर खेळत होतों.  तेथून मला धरून आणिलें.  माझ्या बायकोला तर पाळण्यांतून आणून माझेच मांडीवर बसविलें.  ती माझी आतेबहीण असल्यामुळें पूर्वीपासून माझा तिचा लळा होताच.  लाजावयाचें कसें तें आम्ही शिकावयाचें पुढेंच होतें.  सर्व खर्च आम्ही करून व्याह्यांनीं म्हणजे माझ्या व माझ्या भावाच्या सासर्‍यांनीं बाबांना लग्नांत फार त्रास दिला.  वरपक्षानें हिणवावयाचें तें उलट वधूपक्षांचीच कारवाई फार चालली.  शेवटीं गांवजेवणाचे दिवशीं रात्रीं बारा वाजतां पानें पडलीं.  पण कांहीं तरी भांडण काढून जेवावयाला आलेली बरीच मंडळी पानावरून अभद्रध्वनि काढीत निघून गेली.  ही हकीकत माझी आई पुढें किती दिवस तरी सांगून आमची करमणूक करीत असे.

केळवण  :   आमची हीं तिन्हीं लग्नें सायंकाळी गोरज मुहूर्तावर झालीं.  लग्नसमारंभ ४।५ दिवस यथासांग झाला.  हळदी, रुखवत, रासन्हाणी, अक्षता, लग्नानंतरचे नवरानवरींचे खेळ, नवर्‍याला बागेंत नेणें वगैरे सर्व सोहळे झाले.  लग्नांत केळवणासाठीं इतक्या घरीं जवणास जावें लागलें कीं, मला फारच कंटाळा आला होता.  सर्व ओळखीचीं माणसें एकाच दिवशीं जेवणास बोलावणार.  मग जेवण कसचें होतें !  नुसता भात किंवा शेवयाचें ताट पुढें ठेविलें की त्यावरचा गूळ किंवा साखरेला थोडा हात लावला कीं झालें जेवण !  आणि प्रत्येक घरी वाजंत्रीं लावून जावयाचें असे.  मी अगदीं बेजारून गेलों.

आसंगीचें वर्‍हाड  :   याप्रमाणें हा लग्नाचा धांगडधिंगा संपल्यावर आम्ही सर्व माझ्या बहिणीच्या सासुरवाडीला म्हणजे आसंगी गांवाला निघालों.  हें खेडें जमखंडीच्या पश्चिमेस कुडची स्टेशनच्या वाटेवर ११ मैलांवर आहे.  सुमारें चार पांच गाड्यांच्या भरतीचें वर्‍हाड निधालें.  आमचेबरोबर आमचे आलगुरचे मामा रामजीबाबा हे होते.  फक्त बाबा आणि आई मात्र आलीं नाहींत.  कारण कन्यादान केलें असतां कन्येच्या घरीं आईबापांनी कन्येला मुलें होईपर्यंत अन्नग्रहण करावयाचें नसतें.  आसंगीचे व्याह्याची शेती मोठी व घरही प्रशस्त होतें.  रात्रीच्या वेळीं आम्हीं गांवांत प्रवेश केला.  आमची थाटानें वरात निघाली.  दारूकाम वगैरे चांगला थाट झाला.

पेंढारघाड  :   आसंगीस नदी आहे.  नदीवर व विहिरींत पोणें, यथेच्छ जेवणें आणि रस्त्यांतून धिंगाणा घालणें हाच काय तो आमचा कार्यक्रम होता.  बरोबर आमचे आईबाबा नव्हते.  मग व्याह्यांच्या घरीं आम्हांला कोण दाबांत ठेवणार ?  आमच्या धुडगुशीला ताळच उरला नाहीं.  आम्ही जमखंडीचीं बरींच मुलें होतों.  त्यांत आसंगीच्या मुलांची भर पडली.  मग काय ?  चार दिवसांत आम्हीं त्या खेड्यांत कहर उडवून दिला.  गांवांत एक पेंढारधाड आल्याप्रमाणेंच झालें.  सर्वांत हाल आसंगीच्या गांवडुकरांचे झाले.  आम्ही जमखंडीस असा डुकरांचा जमाव कधींही पाहिला नव्हता.  बोळाबोळांतून डुकरांना आडवून त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून आम्हीं एक मोठें भारतीय युद्धच आरंभिलें.  शेवटीं वृद्धमंडळी बरीच त्रासली.  या खेडेगांवांत आम्ही शहराचे शिकलेले पाहुणे म्हणून आलों होतों.  म्हणून प्रथम प्रथम कोणीच बोलूं शकले नाहींत.  शिवाय व्याही मोठे वजनदार होते.  पण खेड्यांतील वडील लोकांकडून शेवटीं आमची कानउघाडणी झालीच.  अशा रीतीनें आठ दिवस मेजवान्या झोडून आणि मजा करून आम्ही परत जमखंडीस आलों.

आदरांजलि

आदरांजलि

महर्षि विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे यांचें पुनर्मुद्रित केलेले आत्मचरित्र ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हें मीं वाचलें.  ज्यांनी आपलें सबंध आयुष्य सर्वस्वीं समाजसेवेसाठी व अस्पृश्योद्धारासाठी वाहिले अशा या थोर पुरुषाच्या आयुष्यांतील या पुस्तकांत ग्रथित केलेल्या आठवणी वाचल्यानंतर त्यांच्याविषयींचा आदर दुणावतो.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितींतून मार्ग काढून आपलें कार्य आत्यंतिक निष्ठेनें व तळमळीनें सतत करीत राहणें हा गुण असामान्य व्यक्तींच्या चरित्रांत आपणांस प्रामुख्यानें आढळतो.  महर्षि शिंदे यांच्या चरित्रांत आपणांस याचें प्रत्यंतर येतें.  लहानपणची गरिबी, त्यांत अनेक कौंटुंबिक आपत्तींची भर असें असूनहि स्वाभिमान न दुखवतां जेवढी मदत मिळेल तिच्यावर त्यांनी आपलें शिक्षण पुरें केलें.  त्यांच्या दारुण परिस्थितीचा व प्रेमळ मातापित्यांच्या धार्मिक प्रवृत्तींचा त्यांच्यामनावर जो परिणाम झाला त्यामधूनच त्यांना धार्मिक शिक्षण घेण्याची प्रेरणा झाली व मँचेस्टर येथें हें शिक्षण घेऊन परत आल्यावर त्यांनीं धर्मप्रचाराचें काम हातीं घेतलें.  या का-यातूनच पुढें त्यांनीं केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या महान् कार्याचा उदय झाला.
त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा परिपोष त्यांच्याच भाषेंत सांगावयाचें झाल्यास विश्वधर्मापासून सुरुवात होऊन समाजसुधारणा, समाजसेवा व राष्ट्रोद्धार अशा टप्प्यांनी झाला.

तत्कालीन महाराष्ट्रांत ज्या ज्या समाजसुधारणेच्या चळवळी झाल्या त्यांत महर्षि शिंद्यांचें प्रामुख्यानें अंग होतें.  परंतु त्यांच्या आयुष्यांतील अत्यंत मौलिक कार्य म्हणजे अस्पृश्यांची त्यांनी केलेली महान् सेवा.  आपलें सर्व जीवन त्यांनी या कार्यासाठी वेंचलें.  जातिनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष बुद्धीनें त्यांनीं हें कार्य सतत केलें.  तत्कालीन सरकारचीही या का-यात त्यांनीं सहानुभूति मिळविली.  एवढेंच नव्हे तर सतत प्रयत्न करून राष्ट्रीय सभेलाही हें कार्य हातीं घेण्यास त्यांनीं प्रवृत्त केलें.  या कार्याचा पुढें महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालीं प्रचंड वृक्ष फोफावला.

महर्षि शिंद्यांनीं आपल्या हयातींत केलेली धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय क्षेत्रांतील कामगिरी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासांत अद्वितीय गणली जाईल. इतक्या निरपेक्ष, निरलस व तळमळीनें काम करणार्या एका थोर समाजसेवकाच्या चरित्राचा आदर्श तरुण पिढीपुढें सतत राहावा व त्यापासून त्यांना शक्ति व स्फूर्ति मिळावी अशी इच्छा व्यक्त करून ह्या चरित्राच्या रूपानें मराठी वाङ्मयांतील बहुमोल ठेवा वाचकांच्या हातीं दिल्याबद्दल महर्षींच्या चिरंजिवांना मी धन्यवाद देतों.

यशवंतराव चव्हाण

‘माझ्या आठवणी’ संबंधीं

परमुलुखांत नोकरी करीत असतां मी १९३९ चे सुमारास रजेनिमित्त पुण्यास घरीं आलो असतां सहज माझ्या हातीं वडिलांच्या हस्ताक्षरांत लिहिलेली जाडजूड वही लागतांच मीं तीबद्दल कुतूहलानें त्यांना प्रश्न केला.  त्यावर त्यांनी स्वतः १९३० सालीं कायदेभंगाच्या चळवळींत तुरुंगांत असतांना लिहिलेल्या त्या स्वतःच्या आठवणी आहेत असें सांगितलें.  तीर्थरूप त्या वेळीं साठीच्या पलीकडे गेलेले, तशांत त्यांना मधुमेहाचा विकार आणि त्यामुळेंच त्यांच्या दोन्ही हातांना कंपवायूची बाधा झालेली.  अशा स्थितींत भर म्हणूनच कीं काय दृष्टि मंद होऊन त्यांना अजिबात वाचतां येत नव्हतें.  हें सर्व ठाऊक असतांही मीं त्यांना सहज विचारलें, “या आठवणींत तुम्ही भर घालून संपूर्ण आत्मचरित्रच कां लिहीत नाहीं ?” ती अण्णांनीं या माझ्या म्हणण्याला उत्तरच दिलें नाहीं; पण मी तेवढ्यानें कांहीं गप्प बसणार नव्हतों.  एकसारखा पाठपुरावा करून मीं त्यांना त्याबाबत बोलावयास लावलेंच.  परंतु वार्धक्यानें जर्जर झालेल्या निरुत्साही मनःस्थितींतलेंच तें निराशाजनक उत्तर होतें.  पण मीं आपला हेका न सोडतांच सुचविलें कीं, “आत्मचरित्रासंबंधींची जी कांही सामुग्री असेल ती मी मिळवितो, ती तुम्हांस वाचून दाखवितों.  आठवणींचे धागेदोरे जुळवून आपण आत्मचरित्राचें कथन तेवढें करावें.  म्हणजे लिहिण्याचें काम मी स्वतः करीन.”  या कामाला बराच कालावधि लागणार असल्याची वडिलांना खात्री होतीच.  तेव्हां त्यांनी मला प्रश्न केला, “हें सर्व काम कांही एक-दोन महिन्यांचे नाहीं.  त्याला किती तरी महिने लागतील !  तेव्हां तूं नोकरी संभाळून हें सारें कसें करणार ?  शिवाय माझें आत्मचरित्र लोकांसमोर पुस्तकरूपानें यावं असं मलाच मुळांतून वाटत नाहीं.  आणि आतां तर मी इतका थकलेलों आहें कीं, तूं सांगितलेली सूचना पाळून देखील कथन करण्याचे श्रम माझ्याच्यानें होतील असें वाटत नाहीं.  दुसरी गोष्ट अशी कीं, कथन कांही नियमितपणें होईल म्हणावें तर तेंही नाही.  माझी प्रकृति, माझी मनःस्थिति, मनाचा एक विशिष्ट कल या गोष्टी जमेस धरता हें काम सुतराम् कसें पार पडेल याची मोठीच वानवा आहे.  तेव्हां तूं आपला हेका सोडून नोकरीवर जा पाहूं कसा !”
मी ऐकलें नाहीं.  निमूटपणें मीं सामुग्री जमवली आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध बिनपगारी दीर्घकालाची सुटी घेऊन आत्मचरित्राचा पूर्वार्ध संपवला.  आत्मचरित्राचा पूर्वार्ध पुस्तकरूपानें प्रसिद्ध झालेला पाहतांच दुसर्या भागाची तयारी देखील अशाच परिस्थितींत मीं करून टाकली.  पूर्वार्ध छापून प्रसिद्ध करण्याचें काम माझे मित्र श्री. जयवंतराव जगताप यांनी आपल्या ‘वत्सला साहित्य प्रकाशन’ संस्थेतर्फे पुरें केलें; पण दुसर्या भागाचें हस्तलिखित तयार करून त्यांना १९४१ च्या आरंभीं दिलें असतांहि छपाईच्या कामांत त्यांच्याकडून कारणपरत्वें दिरंगाई झाली.  पुढें १९४४ सालीं वडिलांच्या निधनानंतर त्यांनी छपाईचें काम धूमधडाक्यानें सुरू केलें.  समग्र आत्मचरित्र वडिलांच्या हयातींत प्रसिद्ध होण्यासारखें असतांना जयवंतरावांनीं बुद्धिपुरस्सर चालढकल केली आणि त्यांच्या निधनाला अवघा आठवडा लोटतो न लोटतो तोंच पुस्तकप्रसिद्धीबाबत वर्तमानपत्रांतून अगाऊ जाहिरात करून धमाल उडवण्याचा जो उपक्रम आरंभला त्यावरून त्यांच्या व्यवहारी वृत्तीचें कौतुक करावें तेवढें कमीच आहे.  वडिलांनी आपल्या हयातींत, आपल्या डोळ्यांनीं समग्र चरित्राचें प्रकाशन पुस्तकरूपानें पाहावें हाच एक हेतु मनांत बाळगून मी आटाकोट प्रयत्न केले असतां त्यांच्या निधनानंतर पुस्तकाचें प्रकाशन होण्यांत मला तरी विशेष उत्साह वाटत नव्हता.  बरें, इतकं असतांहि पुस्तक हस्तलिखिताबरहुकूम तरी प्रसिद्ध करावयाचें, तें सोडून जयवंतरावांनीं त्यांत जी बेसुमार काटछाट चालवली त्यामुळें मी चकितच झालों.  हस्तलिखितांतील पॅरेच्या पॅरेच नव्हे, तर आठ-आठ दहा-दहा पानें अनावश्यक, नीरस आणि कंटाळवाणा मजकूर या सबबीखालीं काढून टाकण्यास जेव्हां जयवंतरावांनीं आरंभ केला, तेव्हां नाइलाजानें मला त्यांना विरोध करावा लागला.  परिणाम असा झाला कीं, जयवंतरावांनींच हस्तलिलिखातचे सर्व भाग माझ्यापुढें टाकून म्हटलें कीं, ‘हें बाड उचला अन् चालूं लागा.  माझ्याखेरीज दुसरा कोणीही हें काम करील किंवा कसें हें तुम्हांला कळून येईलच !”  एक शब्दहि न उच्चारतां मीं पुढ्यांत टाकलेलें बाड उचलून घरीं आणलें.  वडिलांच्या पश्चात् हस्तलिखितांत कसलीहि काटछाट करण्याचा अधिकार प्रकाशकाला बिलकूल नाहीं, हें परोपरीनें सांगूनही जेव्हां निरुपाय झाला तेव्हांच मला हा मार्ग पत्करावा लागला.  कांही का असेना, पुस्तकाचा पूर्वार्ध तरी वडिलांच्या नजरेस पडला यांतच मी समाधान मानून होतों.  परंतु वडिलांच्या कार्याच्या दृष्टीनें उत्तरार्ध अत्यंत महत्त्वाचा होता.  आणि तो प्रसिद्ध झालेला त्यांनीं पाहिला असता तर माझे घोडें गंगेंत न्हालें असतें.
तीर्थरूपांच्या तोंडून होत असलेल्या आत्मचरित्राचें कथन करतांना मीं दोनच गोष्टींवर त्यांचे विचार काय आहेत हें जाणून घेतलें.  त्या गोष्टी म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद आणि त्यांनीं केलेलें सामाजिक कार्य.  ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद हा इंग्रजांनीं आपल्या भेदनीतीला पूरक म्हणून उपस्थित केला असल्यानें तो सर्वस्वीं त्याज्य आहे असें वडिलांचें स्पष्ट मत होतें.  हिंदु-मुसलमान-वादाप्रमाणें हा वाद देखील देशाच्या एकजुटीला बाधक आहे असें त्यांचें ठाम मत होतें.  शिवाय जातिभेदावर आधारलेला पक्ष केव्हांहि चिरस्थायी असूं शकत नाहीं याची ग्वाही त्यांना मनोमन पटल्यानें त्यांनीं ह्या वादापासून स्वतःला सुरुवातीपासूनच अलिप्त ठेवलें होतें आणि केवळ या एकाच कारणामुळें ब्राह्मणेतरवादीय व्यक्ति त्यांची उपेक्षा करीत, तर सनातनी जातीयवादी उच्चवर्गीय त्यांच्याकडे साशंकतेनें पाहात, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी उघड होती.  एक मात्र खरें कीं विचारवंत व्यक्ति, मग ती कोठल्याहि जातीची असली तरी वडिलांच्या कार्याबद्दल कळकळ व आत्मीयता दर्शवल्यावांचून राहात नसे, ह्याची सत्यता खालील गोष्टीवरून दिसून येईल.  ती अण्णांच्या वाङ्मयीन गुणांचें चीज व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलचा सहानुभूतिपूर्वक विचार जसा उच्चवर्गीयांनीं केला तसाच ब्राह्मणेतर वर्गांतल्या श्रीमंत सयाजीराव किंवा कै. शाहुमहाराज यांनीं देखील केलेला आहे हें आत्मचरित्राचें वाचन करतांना आढळून येईल.

दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला स्वतःच्या कार्याबाबत म्हणावी तशी परिपूर्तता आली नसल्याचें वाटत होतें.  याचें कारण सांगतांना त्यांनीं मजजवळ उद्गार काढले ते असे: “या कामाला पैसा हें कांहीं कारण नव्हतें.  पैशापेक्षां आत्मीय जाणिवेनें काम करण्याची उणीव हेंच एक महत्त्वाचें कारण आहे.  डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेला माझ्या मनासारखी ऊर्जितावस्था आली नाहीं याला पैसा हें कारण बिलकूल नसून आंतरिक तळमळीनें, स्वार्थत्यागी वृत्तीनें काम करण्याची उणीव हेंच एक मोठें कारण आहे.”

सुशिक्षित व सुसंस्कृत वर्गीयांकडून जें कांहीं घेण्यासारखें आहे, तें अवश्य घ्यावें आणि आपला उद्धार करून घ्यावा, असें न करतां केवळ रूढ कल्पना उराशीं बाळगून त्यांच्याबद्दलचा मत्सरग्रस्त पूर्वग्रह मनांत उगाळीत बसून कांहीं आपला कार्यभाग होणार नाहीं, ही गोष्ट जशी मागासलेल्या वर्गीयांनीं अमलांत आणावयाची आहे तशीच उच्चवर्गीयांनीं देखील आपला अहंभाव विसरून मागासलेल्या वर्गीयांकडे तुच्छतेनें न पाहतां त्यांना आपल्यांत वागवूनच घ्यावें हें परिणामीं हितकर होणारें आहे असें ते नेहमींच म्हणत असत.

बर्याच काळानंतर आत्मचरित्राचें समग्र प्रकाशन करण्याचा जो योग आलेला आहे तो समाजाच्या दृष्टीनें अत्यंत उपयुक्त आहे.  हा योग घडवून आणण्याचें कार्य जयवंतराव जगतापांनंतर श्री. ग. ल. ठोकळ यांनीं ज्या धडाडींनें केलें आहे त्याबद्दल त्यांचें अभिनंदन मीच काय पण ती.  अण्णासाहेबांबद्दल आस्था बाळगणारी महाराष्ट्रांतली कोणतीहि विचारवंत व्यक्ति यथोचित केल्याविना राहणार नाहीं.

रवींद्र विठ्ठल शिंदे
पुणें, ता. २ फेब्रु. १९५८

आजोळ

येथवर माझ्या बाबांच्या व त्यांच्या आईबापांच्या आठवणी झाल्या. आतां माझ्या आईच्या आईबापांच्या आठवणींकडे वळूं.

कृष्णराव काळे : जमखंडीच्या पूर्वेस ६ मैलांवर आलगूर म्हणून कृष्णाकांठीं एक खेडेगांव आहे. हें माझ्या आईचें माहेर. माझ्या आईचें नांव यमुनाबाई, तिच्या आईचें नांव गंगाबाई व बापाचें नांव कृष्णराव काळे असें होतें. गुडघीच्या रोगानें त्यांचा एक पाय गुडघ्यांत अगदीं वांकडा झाला. त्यामुळें ते तरुणपणींच कायमचे लंगडे झाले होते. म्हणून त्यांना गांवांत कुंट कृष्णप्पा म्हणजे लंगडा कृष्णराव असें म्हणत असत. जमखंडी संस्थानांत खेड्यांतील सर्व लोक कानडीच बोलतात. मराठी कोणालाच येत नाहीं. माझ्या आजाआजीला मराठी बोलतां येत होतें. आजापेक्षां आजीला जास्त चांगलें येत असे.

पतिव्रता गंगाबाई : बसवंतराव मराठी तर संताबाई जशी कानडी, तशी गंगाबाई मराठी तर कृष्णराव कानडी असें हें जोडपें होतें. गंगाबाई गोरी होती. कृष्णराव अगदीं काळे होते. इकडे बसवंतराव गोरे, तर संताबाई काळी होती. बाबांचें घराणें सुखवस्तु, वजनदार होतें आणि आईचें गरीब होतें. तरी कृष्णरावांचा आलगुरांत चांगला दरारा होता, तो त्यांच्या प्रामाणिकपणामुळें होता. गुडघीच्या रोगानें ते वर्षभर अंथरुणावर खिळलेले होते. गंगाबाईनें त्यांची अतिशय प्रेमानें व श्रध्देनें रात्रेंदिवस शुश्रूषा केली. त्या वेळीं माझी आई ५।६ वर्षांची व तिचा भाऊ सोमा नांवाचा १।२ वर्षांचा होता. आलगूरचे कुळकर्णी गोविंदाप्पा नांवाचे वैष्णव ब्राह्मण मोठे देवमाणूस होते. त्यांची पत्‍नी सरस्वतीबाई, वडील बंधु बाबासाहेब व एकंदरींत सर्व घराणें अगदीं बाळबोध, प्रेमळ व प्रामाणिक असे. कुष्णरावांना या घराण्याचा मोठाच आश्रय होता. कृष्णरावाचें या घराण्यांत त्यांच्या प्रामाणिकपणामुळें मोठें वजनही होतें. एक वर्षाच्या आजारांत आमची आजी नेहमीं अंथरुणाला धरून बसलेली राहिल्यामुळें चूल आणि मुलाचा सर्व जोजार (भार) माझ्या आईवरच पडला. तेवढ्या लहान वयांतही तिनें तो बिनबोभाट चालविला. या लहानपणाच्या हालानें आमच्या आईला पुढें सहिष्णुतेचें व दक्षतेचें चांगलेंच वळण लागलें. माझ्या आईचा सारा जन्मच सहन करण्यांत गेला. तें सामर्थ्य तिनें लहानपणींच माहेरीं मिळविलें होतें. माझी आजी व तिची नमुनेदार मुलगी माझी आई हीं दोन माणसें सार्‍या आलगूर गांवाला पातिव्रत्याचा व हिंदु स्त्रियेच्या चांगुलपणाचा एक अनुपम नमुनाच वाटत होता. अद्याप त्यांचें नांव काढलें, तर त्यांची माहिती असणारांपैकी न गहिंवरणारें माणूस त्या गांवांत सांपडणार नाहीं.

आमचा तोरा : जमखंडीस बाबांच्या घराण्याचा लौकिक व आलगुरांत आईच्या घराण्याविषयीं असा अकृत्रिम आदर यांची जोड साधल्यामुळें आम्ही लहानपणीं जेव्हां आजोळीं जात असूं तेव्हां सारा गांव आमचें नेहमीं कौतुक करीत असे. वाटेंत कुंभारहाळ हें गांव लागे. तेथूनच आमच्या स्वागताला सुरुवात होई. यामुळें आम्हांलाही मोठी आढ्यता वाटत असे. लागुरास जाण्यास आम्ही एका पायावर तयार असूं. माझ्या बाबांच्या आईचा स्वभाव कडक व सहानुभूतिशून्य असल्यामुळें माझ्या आईला पुढें सासुरवास सोसावा लागला. आपण भोगलेल्या त्रासाचे मासले ती आम्हांस बालपणीं सांगूं लागली, म्हणजे आमच्या कोमल अंतःकरणाला घरेच पडत. माझ्यामध्यें पुढें पुढें जें स्त्रीदाक्षिण्य आणि हिंदुविवाहपद्धतीसंबंधीं कायमची तेढ उत्पन्न झाली, तिचें पहिलें बीज ह्या आईच्या खडतर सासुरवासांतच आहे. आईच्या माहेरचीं माणसें-आजा असो, आजी असो, आईचा भाऊ रामजी असो किंवा माझी मावशी तान्हुबाई असो- जमखंडींत आमच्या वाड्यांत आलीं म्हणजे मुठीत जीव धरून येत. उलट आम्ही कोणी आलगुरांत गेलों कीं, जसे बडे बापके बेटेच असें वागत असूं. नुसत्या आजाच्या घरांतच नव्हे, तर सार्‍या खेड्यांतूनच आम्ही आमचा तोरा चालवीत असूं.

आम्ही शहरांत राहणारे, शाळेंत शिकणारे, मराठी बोलणारे, खाणें-पिणें-पोषाख यांची मिजास चालविणारे आणि सरकारदरबारांत वजन असलेल्या सुप्रसिद्ध व कडक बापाचीं मुलें. मग काय ? आम्हांला या खेड्यांत स्वर्ग दोनच बोटें उरत असे. आम्हांला आलगूर फार आवडे. याचें कारण तो नदीकांठचा गांव तेथील स्वच्छ हवा, गोड पाणी, साधी राहाणी व तेथें चालणारे आमचे चोचले !

आजोबांचा पाय लंगडा असल्यामुळें ते आम्हांस बोलावण्यासाठीं आलगुराहून आपल्या वांझ म्हशीवर बसून येत. पोषाख खादीचा मांडचोळणा, खादीची बंडी, एक काळें दणकट कांबळें आणि डोईला तपकिरी रंगाचा एक भलामोठा रुमाल. काटक चेहरा, मिशा पांढर्‍या झुबकेदार आणि आवाज खणखणीत. एकंदरीनें स्वारी जरी ठेंगणी होती, तरी एखाद्या गनिमी काव्याच्या नायकाप्रमाणें पाहिल्याबरोबर नजरेनेंच पाहणार्‍याला नरम करणारी त्यांची मुद्रा होती.

आलगूरच्या आजोबांचें घर चंद्रमौळी, भांडीं मातीचीं. अंथरूणपांघरूण जमखंडीहून नेलेलें तेवढेंच. शिवाय लागेल तें शेजार्‍यांकडून आणलेलें. कण्यांत घालावयास मीठदेखील शेजारणीकडे मागावयाला एखाद्या आम्हांला पाहावयाला आलेल्या गचाळ मुलीला आजी मोठ्या मायाळुपणानें सांगे. आणि तिला कोणतीही वस्तु कोण नको म्हणेल ? त्या वेळीं खेड्यांतून हल्लींचा रशियांतील कम्यूनिझमच होता. म्हणजे कोणतीही वस्तु प्रत्येकानें कोणालाही हक्कानें मागावी. यामुळें आम्हांला पाहुणचार फार आवडे. गेल्याबरोबर आम्हांला पाहायला आळींतील लहानमोठीं पोरें व त्यांच्या पोरकट आयांचा घोळका आमच्याभोंवतीं जमे. हाकलून दिलें तरी जातात कशाला ? लक्कव्वा, सिद्दाव्वा, पद्मक्का वगैरे म्हातार्‍या ओरडून ओरडून कानठाळ्या बसवीत मजजवळ येत. कोणी म्हणे माझ्याशीं लग्न कर, कोणी म्हणे पाट लाव, कोणी म्हणे तूं माझा नवराच - इतके दिवस सोडून कोठें गेला होतास - आतां पोटकी टाक वगैरे. ही रानटी थट्टा ऐकून आम्ही चिडत असूं. त्यामुळें त्यांचा हंशा जास्तच पिके.

आजीचें घर : आजीचें घर धाब्याचें. जमीन धुळीनें भरलेली. न झाडावी तेंच बरें. सोपा कोठें संपला व गोठा कोठें सुरू झाला हें तीन आठवडे राहिलों तरी समजलें नाहीं. निजलों असतांना रात्रीं म्हशीचें पारडूं मुसकटींत शिरावयाचें किंवा आमच्या तंगड्या त्या वांझ म्हशीच्या शिंगांत गुंतावयाच्या ! आजीची चूल घर बांधल्यानंतर सारवली असेल तर गांवच्या मारुतीची शपथ ! खोलींत दोन मडकीं, एक काथवट व एक भला मोठा पाटा. तो सुध्दां कधीं उभा करावयाचा नाहीं. मग धुवायची गोष्ट कशाला ! मीठ असेल तर लसूण नाहीं व दोन्ही असलें तर मिरची नाहीं, हें रोजचें रडगाणें. तरी तिची तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी, घट्ट ताक आणि ताज्या शाळूच्या भाकरी हें जेवण आम्हांला परमामृतासारखें गोड लागे. वांग्यांची भाजी तर सुखाची परमावधि ! कृष्णातीरचीं बांगीं प्रसिद्धच आहेत.

देवघर म्हणून जी एक खोली होती ती एक काळोखाचे पेवच होतें. भर दोन प्रहरींही तिथें जाण्याची छाती होत नसे. भिंतीला व जमिनीला लोणा चढलेला. देव्हार्‍यावर देव कोण होते, किती होते कीं मुळींच नव्हते, हें शोधायला धाडशी कोलंबसच आला पाहिजे. खिडकी तर नव्हतीच. एक साणें होतें. तें जर उघडलें तर वरून जो दोन प्रहरीं प्रकाश पडे, त्यामुळें त्या गुहेला अधिकच भयानक स्वरूप येईल. अशा देवघरांतील देव होण्यापेक्षां बाहेरील मोकळ्या हवेंतील गोठ्यांतील म्हशीचें पारडूं होणें बरें वाटे !

सावलींतील तुळस : माझ्या बाबांची आई जशी धार्मिक होती तशी आईची आई धार्मिक दिसत नव्हती. पण ती स्वतःच धर्माची मूर्ति होती. निराळा धर्म तिला कोठून येईल ? ती नांवाप्रमाणें आंतबाहेर शुभ्र यशाची गंगाच होती आणि तिच्या कुशींतून माझी आई यमुना निघालेली. गंगाबाईचा देव म्हणजे तिचा लंगडा नवरा. मराठ्यांतला पडदानशीनपणा तिच्यांत नव्हता. तरी पण ती उंबरठा ओलांडून कधीं बाहेर जात नसे. खेड्यांतील स्त्रिया शेतांत खपतात, पाणी आणतात व अष्टौप्रहर उघड्यावर असतात. प्रत्यक्ष माझ्या बाबांची आई उघड्यांत वाढलेली रानदांडगी बाई होती. पण गंगाबाई सावलींतील तुळस होती. कधीं म्हणून शेजारणीकडे बालायला गेली, अशी गोष्ट कशाला ! हा जातिवंत मराठमोळा कांहीं औरच होता. ज्या कुळकर्ण्याच्या घराचा आजाला आश्रय होता तें घराणें वैष्णव ब्राह्मणाचें असून मोठें धार्मिक होतें. वैष्णव कर्मठ असावयाचेच. विधि, संस्कार, उपवास, व्रतें, गाणीं, न्हाणीं, सौभाग्यलेणीं इत्यादींची तिथें लयलूट होती. ह्या सर्वांचा जन्मजात संस्कार माझ्या आईच्या हाडाहाडांत व रोमरोमांत शिरला होता. ती एखाद्या वैष्णव ब्राह्मणीप्रमाणें दिसत होती. पण माझी आजी अगदीं साधी, तिच्यांत रूढ धर्माचा कसलाही वरपंग नव्हता. इतकेंच नव्हें तर तिच्यांत धर्मभोळेपणाही नव्हता. मग कर्मठपणाचें तर नांवच नको. हा प्राणीच कांही विरळा होता. आळींतल्या स्त्रिया गंगाबाईचें नांव घेऊनच आपणांस पवित्र मानीत होत्या. साध्या रोगावर माझी आजी कांहीं साधे उपचार करी. कावीळ झाली असतां ती नेमक्या ठिकाणीं मणगटांत बिबा घाली व त्यामुळें अचूक गुण येई. उसण भरली असतां ती उतारा करी. वनस्पतीपेक्षां अशा वैद्यकीय श्रध्देचाच जोर असावयाचा, हें सांगावयास नको. अशा अकृत्रिम पवित्र पातिव्रत्याला आकर्षून घेणारे आमचे आजोबाही तसेच पात्र आणि गरीब असूनही बाणेदार पति होते. नदीचें पाणी आणायलाही कधी त्यांनीं आपल्या बायकोला बाहेर पाठविलें नाहीं. गुडघी रोग होण्यापूर्वी ते सामर्थ्यवान् व हिंमतवान् होते. ज्या कुलकर्ण्याच्या आश्रयाला ते होते त्याच्या घरावर एकदां दरोडा आला. त्या वेळीं एकट्या आजोबांनीं आरोळ्या फोडून व धोंडे फेकून त्यांना पिटाळून लाविलें.

जमखंडीचे आजाआजी वारल्यावर लवकरच सुमारे इ.स.१८८२-८३ सालीं आजोबा कृष्णराव आलगूर मुक्कामीं आषाढ किंवा श्रावण मासीं उद्‍भवलेल्या पटकीचे उपद्रवानें वारले. त्या वेळीं नदीला पूर आला होता. मी नदीवर स्मशानयात्रेला गेलों होतों. मला तो देखावा चांगला आठवतो.

माझी मावशी तान्हूबाई हिचा सनाळांत रामजी शिंदे यांच्याशीं विवाह झाला. ती आतां म्हातारी झाली आहे. शेतवाडी करून तें सर्व कुटुंब सुखी आहे.

माझे मामा : आलगुरांत माझा मामा रामजी हा मात्र दिवाळखोर कर्जबाजारी निघाला. अगदीं लहानपणीं लाडका, तरुणपणीं प्रथम चांगला नांवाजलेला पहिलवान होता, पण पुढें तमाशांत विदूषकाचें काम करणारा निघाला. त्याची बायको लक्ष्मीबाई ही सनाळची. हिला दोन मुली व एक मुलगा होता. त्यांपैकीं एक मुलगा व मुलगी वारली आणि मामीही सुमारें १८९२ सालीं वारली. एकुलती एक मुलगी मथुराबाई पोरकी झाली, म्हणून आमचे घरींच जमखंडीस वाढली. ती पुढें पुणें ट्रेनिंग कॉलजची थर्ड इयरची परीक्षा चांगली पास झाली. नंतर माझे धाकटे बंधु एकनाथराव यांच्याशीं तिचा विवाह झाला. १९१६ सालीं तिला गंगूबाई ऊर्फ छबु नांवाची पहिली मुलगी झाली. १९१८ च्या मोठ्या इन्फ्ल्युएंझाच्या सांथींत मथुराबाई मुंबईस बाळंतपणांत वारली. छबूला पुढें मलाच सांभाळावें लागलें.

आमचा मामा रामाजीबावा हा दिवाळखोर निघाला, म्हणून आमच्या आजीचे फार हाल झाले. १८९७ च्या दुष्काळांत स्वतः आमचेही हाल झाले. शेवटीं १९०१ सालीं ती आमचे घरीं येऊन राहिली होती. सप्टेंबर १९०१ मध्यें मी धर्मशिक्षणासाठीं विलायतेला गेलों. म्हणून माझे आई, बाबा व इतर मंडळी पुण्यास व मुंबईस आली होती. आजी मात्र जमखंडीस आमचे घरीं असतांनाच वारली. ह्या गोष्टीचें मला आतां राहून राहून वाईट वाटतें.

अहल्याश्रमाची तयारी

लेडी विलिंग्डन  :   १९१३ सालीं मी पुण्यास येऊन राहूं लागल्यावर मुंबईचे गव्हर्नरचे जागीं लॉर्ड विलिंग्डन हे आले.  त्यांची उत्साही पत्‍नी लेडी विलिंग्डन यांच्या कानांवर माजी गव्हर्नरकन्या ख्रिस्तवासी मिस् व्हायोलेट क्लार्क हिची हकिकत गेली असावी.  लेडी विलिंग्डन ह्या पुण्यास राहण्यास आल्याबरोबर पुण्यांतील मिशनचें काम समक्ष पाहण्याची इच्छा त्यांनीं मला पत्रानें कळवली.  मला मिस् क्लार्कची आठवण झाली.  मोठमोठ्या परकीय अधिकार्‍यांना त्यांच्या घरच्या मंडळीचें कसें सहकार्य असतें ह्याची मला खात्री पटली.  लागलीच मी एक मिशनची जाहीर सभा बोलावली.  मोठा शामियाना घातला.  अस्पृश्य बायकामुलें व त्यांच्या मदतीला वेळोवेळीं येणार्‍या गांवांतील प्रतिष्ठित स्त्रियाही बोलावल्या.  ठरल्या वेळीं नियमितपणें लेडी विलिंग्डन शामियानांत आल्या.  जमलेला मोठा मिश्र समाज पाहून त्यांना आश्चर्य वाटलें.  प्रमुख स्त्रीपुरुषांचा परिचय झाल्यावर कामाची अपूर्वता पाहून त्यांना आनंद वाटला.  शाळेची टापटीप, विद्यार्थ्यांची प्रसन्न वदनें, विशेषतः त्यांची चित्तवेधक व तालसुरावर झालेली कवाईत पाहून बाई रममाण झाल्या.  पुणें शाखेच्या अस्पृश्य मुलांना कवाईत शिकवण्यासाठीं अस्पृश्यवर्गाचाच लष्करी पेन्शनर मिळत असे.  बँडच्या चालीवर निशाणीची कवाईत तो फार उठावदार करी.  कवाईत संपल्याबरोबर लेडी विलिंग्डन माझ्या कानांवर विनोदानें म्हणाल्या, ''मि. शिंदे हे गरीब लोक पुढें एके काळीं हिंदुस्थानचे राजे होतील !''  तितक्याच विनोदानें मीं उत्तर दिलें, ''बाईसाहेब, आपला आशीर्वाद खरा होणार यांत मला तिळमात्र संदेह नाहीं.  पण हे लोक राजे झाल्यावर आपण आपली तशरीफ कोठें न्याल ?''  बाई मनःपूर्वक हंसल्या.  पुढें लॉर्ड विलिंग्डननें मिशनला जी वेळोवेळीं उदार मदत केली आणि मिशनच्या चालकांशीं मिळून वागले त्याचें हें पूर्वचिन्ह होतें.

आश्रमासाठीं जागा  :  ह्यापुढें मी ह्या शाखेच्या स्वतंत्र इमारतीच्या तयारीला लागलों.  त्याप्रीत्यर्थ श्रीमंत सर तुकोजीराव होळकरांकडून २०००० रु. ची रोख देणगी मिळाली होती.  देणगींतून पुणें शाखेसाठीं ज्या इमारती व्हावयाच्या होत्या त्यांना ''अहल्याश्रम'' हें नांव देण्याचें ठरलें होतें.  त्या आश्रमासाठीं प्रशस्त जागा हुडकुं लागलों.  नानाच्या पेठेंत जेथें हल्लीं पोलीस क्वार्टर्स आहेत त्याच्या उत्तरेला भोकरवाउी म्हणून अस्पृश्यांची एक कंगाल वसती आहे.  ती त्या वेळीं अत्यंत गलिच्छ स्थितींत होती.  तिच्या आजूबाजूंस जवळ जवळ दोन फर्लांग मैदानाची उघडी जागा होती.  तें सर्व स्थळ इतकें उजाड आणि भयाण दिसत होतें कीं, दिवसाढवळ्या तेथें जाण्याला कोणी धजत नसत.  खांचखळगे, कांटेखडेच नव्हे तर जनावरांच्या हाडाचे मोठमोठे सांपळे, चिंध्या, मोडके डबे वगैरे कंगालांच्या संपत्तीचें हें मैदान एक उघडें भांडारच होतें.  हल्लीं ज्याला 'आयर्विन रोड' म्हणून मोठें आढ्यतेचें नांव आलें आहे त्यावर पोलीस लोकांच्या वस्तीचें ठाणें असूनही हा रस्ता सामान्यपणें दुरुस्त आणि स्वच्छ ठेवणें हें त्या वेळच्या म्युनिसिपालिटीला आपलें कर्तव्य वाटत नसे.  कारण तेथें रहदारी फार नसे.  मृतमांस खाण्याची संवय भोकरवाडींतील लोकांना असल्यामुळें तेथें ओंगळ अवशेष चोहींकडे अस्ताव्यस्त पडलेले असत.  भोंवतालच्या जुन्या वठलेल्या वटवृक्षावर भयानक पांढर्‍या गिधाडांचे कळप वस्ती करून होते.  प्रसंगीं खून-मारामार्‍याही होत.  अशा स्थितींतलें हें सात एकरांचें मैदान पाहून आमच्या भावी ''अहल्याश्रमाला'' हें ठिकाण योग्य आहे असें मीं ठरविलें.  मागितल्याबरोबर ही सात एकरांची जागा (पुणें शहर सर्व्हे नं. ७) आमच्या आश्रमासाठीं पुणें शहर म्युनिसिपालिटीनें ९९ वर्षांच्या करारानें दोन निरिनराळ्या भाडेपट्टया करून आमच्या मिशनच्या स्वाधनी केली.  प्रथम ता. २२।७।१५ रोजीं पहिला पट्टा २ एकर ३० गुंठ्यांचा दरसाल १ रु. भाड्यांनें तयार करण्यांत आला.  पुढें ही जागा पुरणार नाहीं असें वाटल्यावरून बाकी उरलेल्या ३ एकर २३ गुंठ्यांची जागा ता. १३।४।२२ रोजीं म्हणजे एकंदर ७ एकरांचें मैदान ९९ वर्षांच्या करारानें दरसाल २ रु. भाड्यांनें मिशननें म्युनिसिपालिटीकडून घेतलें.  भाड्यांचे हे दोन रुपये केवळ मालकी हक्कासाठीं ठरविण्यांत आले होते.  हीं. ९९ वर्षे संपल्यावर पुन्हां वेळोवेळीं नवी भाडेपट्टी करण्याचा अधिकार मिशननें राखून ठेवला आहे.  ही जागा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेळीं त्यांच्या संस्थेकडे होती.  ती पुढें सरकारकडे जाऊन त्यानंतर म्युनिसिपालिटीची घटना झाल्यावर पुणें म्युनिसिपालिटीकडे गेली होती आणि आतां हें मिशननें प्रसिद्ध ज्योतिबांचेंच काम पुढें चालवलेलें आहे.  ह ऐतिहासिक परंपरा सिद्ध करून दाखंविल्यावर पुणें शहर म्युनिसिपालिटीनें हे भाडेपट्टे करून एवढी मोठी जागा देण्याला आढेवेढे घेतले नाहींत आणि त्याला सरकारी मंजुरीही सहजच मिळाली.

शिष्टमंडळ  :  २०,००० रु. आरंभींची मोठी देणगी, त्यानंतर एवढी मोठी जागा मिळाल्यावर सरकारकडून इमारतीची ग्रँट मिळविणें हें क्रमप्राप्‍तच होतें.  लगेच भावी इमारतीचे नकाशे आणि खर्चाचीं अंदाजपत्रकें वगैरे सोबत जोडून रीतसर अर्ज मदतीसाठीं विद्याखात्याच्या अधिकार्‍यांकडे पाठविण्यांत आला.  १९१३ सालीं जुलैमध्यें लॉर्ड विलिंग्डनकडे खास डेप्युटेशन नेण्यांत आलें.  त्यावरून पुणें येथील इमारतीसाठीं रु. २०,००० ची मदत देण्याचा ठराव झाला.  ही मदत बादशहा पंचम जॉर्ज यांच्या १९१२ सालच्या भेटीप्रीत्यर्थ वांटलेल्या रकमेंतून हिंदुस्थान सरकारकडून मिळावयाची होती.  पण पुढें १९१४ सालीं आकस्मिकपणें महायुद्धाची आपत्ति आल्यानें इमारतीचें हें काम नाइलाजानें व इमारतीच्या खर्चाची रक्कम रोख न मिळाल्यानें सहा वर्षे पुढें ढकलण्यांत आलें.

वरील शिष्टमंडळानें मिशनच्या मुंबई, पुणें आणि हुबळी शाखांतील विद्यार्थीवसतिगृहाचें चाललेलें सुंदर काम आणि एन. एम. वाडिया ट्रस्टीकडून मिळालेल्या देणगीनें, मुंबई आणि पुणें येथें चाललेल्या औद्योगिक शिक्षणाची महत्त्वाची योजना वगैरे चालू गोष्टी लॉर्ड विलिंग्डनला नीट समजावून दिल्यावर त्यांनीं मिशनला विशेष सवलतीची ग्रँट-इन-एड देण्याचें आश्वासन दिलें.  मिशनच्या शिक्षणसंस्थांनीं जो खर्च केला असेल त्याच्या निम्म ग्रँट देण्याचें त्यांनीं आश्चासन दिलें.  वसतिगृहाच्या मदतीसाठीं ग्रँट-इन-कोडमध्यें कांहींच तरतूद नसली तरी दरसाल रु. २००० पेक्षां जास्त नाहीं इतकी मदत त्यांनीं देऊं केली आणि चालू युद्धाची सबब न सांगतां ही विशेष मदत सालोसाल रोख मिळत गेली.

 :   १९१३ सालीं मी पुण्यास येऊन राहूं लागल्यावर मुंबईचे गव्हर्नरचे जागीं लॉर्ड विलिंग्डन हे आले.  त्यांची उत्साही पत्‍नी लेडी विलिंग्डन यांच्या कानांवर माजी गव्हर्नरकन्या ख्रिस्तवासी मिस् व्हायोलेट क्लार्क हिची हकिकत गेली असावी.  लेडी विलिंग्डन ह्या पुण्यास राहण्यास आल्याबरोबर पुण्यांतील मिशनचें काम समक्ष पाहण्याची इच्छा त्यांनीं मला पत्रानें कळवली.  मला मिस् क्लार्कची आठवण झाली.  मोठमोठ्या परकीय अधिकार्‍यांना त्यांच्या घरच्या मंडळीचें कसें सहकार्य असतें ह्याची मला खात्री पटली.  लागलीच मी एक मिशनची जाहीर सभा बोलावली.  मोठा शामियाना घातला.  अस्पृश्य बायकामुलें व त्यांच्या मदतीला वेळोवेळीं येणार्‍या गांवांतील प्रतिष्ठित स्त्रियाही बोलावल्या.  ठरल्या वेळीं नियमितपणें लेडी विलिंग्डन शामियानांत आल्या.  जमलेला मोठा मिश्र समाज पाहून त्यांना आश्चर्य वाटलें.  प्रमुख स्त्रीपुरुषांचा परिचय झाल्यावर कामाची अपूर्वता पाहून त्यांना आनंद वाटला.  शाळेची टापटीप, विद्यार्थ्यांची प्रसन्न वदनें, विशेषतः त्यांची चित्तवेधक व तालसुरावर झालेली कवाईत पाहून बाई रममाण झाल्या.  पुणें शाखेच्या अस्पृश्य मुलांना कवाईत शिकवण्यासाठीं अस्पृश्यवर्गाचाच लष्करी पेन्शनर मिळत असे.  बँडच्या चालीवर निशाणीची कवाईत तो फार उठावदार करी.  कवाईत संपल्याबरोबर लेडी विलिंग्डन माझ्या कानांवर विनोदानें म्हणाल्या, ''मि. शिंदे हे गरीब लोक पुढें एके काळीं हिंदुस्थानचे राजे होतील !''  तितक्याच विनोदानें मीं उत्तर दिलें, ''बाईसाहेब, आपला आशीर्वाद खरा होणार यांत मला तिळमात्र संदेह नाहीं.  पण हे लोक राजे झाल्यावर आपण आपली तशरीफ कोठें न्याल ?''  बाई मनःपूर्वक हंसल्या.  पुढें लॉर्ड विलिंग्डननें मिशनला जी वेळोवेळीं उदार मदत केली आणि मिशनच्या चालकांशीं मिळून वागले त्याचें हें पूर्वचिन्ह होतें.

आश्रमासाठीं जागा  :  ह्यापुढें मी ह्या शाखेच्या स्वतंत्र इमारतीच्या तयारीला लागलों.  त्याप्रीत्यर्थ श्रीमंत सर तुकोजीराव होळकरांकडून २०००० रु. ची रोख देणगी मिळाली होती.  देणगींतून पुणें शाखेसाठीं ज्या इमारती व्हावयाच्या होत्या त्यांना ''अहल्याश्रम'' हें नांव देण्याचें ठरलें होतें.  त्या आश्रमासाठीं प्रशस्त जागा हुडकुं लागलों.  नानाच्या पेठेंत जेथें हल्लीं पोलीस क्वार्टर्स आहेत त्याच्या उत्तरेला भोकरवाउी म्हणून अस्पृश्यांची एक कंगाल वसती आहे.  ती त्या वेळीं अत्यंत गलिच्छ स्थितींत होती.  तिच्या आजूबाजूंस जवळ जवळ दोन फर्लांग मैदानाची उघडी जागा होती.  तें सर्व स्थळ इतकें उजाड आणि भयाण दिसत होतें कीं, दिवसाढवळ्या तेथें जाण्याला कोणी धजत नसत.  खांचखळगे, कांटेखडेच नव्हे तर जनावरांच्या हाडाचे मोठमोठे सांपळे, चिंध्या, मोडके डबे वगैरे कंगालांच्या संपत्तीचें हें मैदान एक उघडें भांडारच होतें.  हल्लीं ज्याला 'आयर्विन रोड' म्हणून मोठें आढ्यतेचें नांव आलें आहे त्यावर पोलीस लोकांच्या वस्तीचें ठाणें असूनही हा रस्ता सामान्यपणें दुरुस्त आणि स्वच्छ ठेवणें हें त्या वेळच्या म्युनिसिपालिटीला आपलें कर्तव्य वाटत नसे.  कारण तेथें रहदारी फार नसे.  मृतमांस खाण्याची संवय भोकरवाडींतील लोकांना असल्यामुळें तेथें ओंगळ अवशेष चोहींकडे अस्ताव्यस्त पडलेले असत.  भोंवतालच्या जुन्या वठलेल्या वटवृक्षावर भयानक पांढर्‍या गिधाडांचे कळप वस्ती करून होते.  प्रसंगीं खून-मारामार्‍याही होत.  अशा स्थितींतलें हें सात एकरांचें मैदान पाहून आमच्या भावी ''अहल्याश्रमाला'' हें ठिकाण योग्य आहे असें मीं ठरविलें.  मागितल्याबरोबर ही सात एकरांची जागा (पुणें शहर सर्व्हे नं. ७) आमच्या आश्रमासाठीं पुणें शहर म्युनिसिपालिटीनें ९९ वर्षांच्या करारानें दोन निरिनराळ्या भाडेपट्टया करून आमच्या मिशनच्या स्वाधनी केली.  प्रथम ता. २२।७।१५ रोजीं पहिला पट्टा २ एकर ३० गुंठ्यांचा दरसाल १ रु. भाड्यांनें तयार करण्यांत आला.  पुढें ही जागा पुरणार नाहीं असें वाटल्यावरून बाकी उरलेल्या ३ एकर २३ गुंठ्यांची जागा ता. १३।४।२२ रोजीं म्हणजे एकंदर ७ एकरांचें मैदान ९९ वर्षांच्या करारानें दरसाल २ रु. भाड्यांनें मिशननें म्युनिसिपालिटीकडून घेतलें.  भाड्यांचे हे दोन रुपये केवळ मालकी हक्कासाठीं ठरविण्यांत आले होते.  हीं. ९९ वर्षे संपल्यावर पुन्हां वेळोवेळीं नवी भाडेपट्टी करण्याचा अधिकार मिशननें राखून ठेवला आहे.  ही जागा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेळीं त्यांच्या संस्थेकडे होती.  ती पुढें सरकारकडे जाऊन त्यानंतर म्युनिसिपालिटीची घटना झाल्यावर पुणें म्युनिसिपालिटीकडे गेली होती आणि आतां हें मिशननें प्रसिद्ध ज्योतिबांचेंच काम पुढें चालवलेलें आहे.  ह ऐतिहासिक परंपरा सिद्ध करून दाखंविल्यावर पुणें शहर म्युनिसिपालिटीनें हे भाडेपट्टे करून एवढी मोठी जागा देण्याला आढेवेढे घेतले नाहींत आणि त्याला सरकारी मंजुरीही सहजच मिळाली.

शिष्टमंडळ  :  २०,००० रु. आरंभींची मोठी देणगी, त्यानंतर एवढी मोठी जागा मिळाल्यावर सरकारकडून इमारतीची ग्रँट मिळविणें हें क्रमप्राप्‍तच होतें.  लगेच भावी इमारतीचे नकाशे आणि खर्चाचीं अंदाजपत्रकें वगैरे सोबत जोडून रीतसर अर्ज मदतीसाठीं विद्याखात्याच्या अधिकार्‍यांकडे पाठविण्यांत आला.  १९१३ सालीं जुलैमध्यें लॉर्ड विलिंग्डनकडे खास डेप्युटेशन नेण्यांत आलें.  त्यावरून पुणें येथील इमारतीसाठीं रु. २०,००० ची मदत देण्याचा ठराव झाला.  ही मदत बादशहा पंचम जॉर्ज यांच्या १९१२ सालच्या भेटीप्रीत्यर्थ वांटलेल्या रकमेंतून हिंदुस्थान सरकारकडून मिळावयाची होती.  पण पुढें १९१४ सालीं आकस्मिकपणें महायुद्धाची आपत्ति आल्यानें इमारतीचें हें काम नाइलाजानें व इमारतीच्या खर्चाची रक्कम रोख न मिळाल्यानें सहा वर्षे पुढें ढकलण्यांत आलें.

वरील शिष्टमंडळानें मिशनच्या मुंबई, पुणें आणि हुबळी शाखांतील विद्यार्थीवसतिगृहाचें चाललेलें सुंदर काम आणि एन. एम. वाडिया ट्रस्टीकडून मिळालेल्या देणगीनें, मुंबई आणि पुणें येथें चाललेल्या औद्योगिक शिक्षणाची महत्त्वाची योजना वगैरे चालू गोष्टी लॉर्ड विलिंग्डनला नीट समजावून दिल्यावर त्यांनीं मिशनला विशेष सवलतीची ग्रँट-इन-एड देण्याचें आश्वासन दिलें.  मिशनच्या शिक्षणसंस्थांनीं जो खर्च केला असेल त्याच्या निम्म ग्रँट देण्याचें त्यांनीं आश्चासन दिलें.  वसतिगृहाच्या मदतीसाठीं ग्रँट-इन-कोडमध्यें कांहींच तरतूद नसली तरी दरसाल रु. २००० पेक्षां जास्त नाहीं इतकी मदत त्यांनीं देऊं केली आणि चालू युद्धाची सबब न सांगतां ही विशेष मदत सालोसाल रोख मिळत गेली.

  1. अंतर्बाह्य खळबळ
  2. मुंबईतील स्थानिक कार्यक्रम
  3. ब्राह्मधर्मसूचि ग्रंथ
  4. प्रीव्हियचें वर्ष
  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
Page 49 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी