1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मंत्र आणि तंत्र

वैदिक ऊर्फ ब्राह्मण धर्मांची आणि शैव, शाक्त, बौद्ध, जैन, वैष्णव आणि तर वैदबाह्य ऊर्फ भागवत धर्मांची झटापट सुमारें २००० वर्षांपूर्वीं भरतखंडांत कशी लागली, हें वर सांगितलें. बौद्ध व जैनांप्रमाणेंच शैव व वैष्णवादिक संप्रदायांना मी वेदबाह्य म्हणत आहें, ह्यांचे ब-याच तज्ज्ञांनाहि आश्चर्य वाटेल. वैदिक धर्माला मी ब्राह्मण धर्म म्हणत आहे, ह्यासंबंधीं कांहींजण आक्षेप घेतील, पण विचार व शोधाअंतीं माझे म्हणण्याची सत्यता सहज पटण्यासारखी आहे. जेव्हां वैदिक धर्माला केवळ पोकळ कर्मठपणाचें स्वरूप आलें, यज्ञयाग करणें कांहीं विशिष्ट वृत्तींच्या माणसांचा धंदा झाला व त्यांची एक जात अथवा जूट (Guild) बनूं लागली, तेव्हांच ह्या पोकळ कर्ममार्गाच्या उलट विरक्त ज्ञानमार्गाची उठावणी झाली. कर्ममार्गी ब्राह्मण आणि ज्ञानमार्गी क्षत्रिय अशा दोन जुटी किंवा जाती उपनिषद्-काळीं आर्य लोकांमध्यें निर्माण झाल्या, आणि जे आर्य ह्या धर्माच्या अगर परमार्थाच्या भानगडींत न पडतां आपली शेती, गुरेंढोरें, धंदा वगैरे ऐहिक व्यवहारांतच तृप्त राहून दिवस काढीत, त्यांची गणना वैश्य अथवा आर्यांचा बहुजनसमाज ह्या नांवाखालीं होऊं लागली. ह्या तीन जुटींचे तीन भिन्न वर्ण मानले जाऊन त्यांचें प्रथम त्रैवर्ण्य बनलें. पुढें ब-याच काळानें ज्या आर्येतरांनीं आर्यांच्या धार्मिक चालीरीति आणि आश्रय स्वीकारिला त्यांचा एक निराळा हीन वर्ण ‘शूद्र’ या नांवानें मानण्यांत आला. उपनिषद्काळांत चातुर्वर्ण्य नव्हतें, किंबहुना त्रैवर्ण्याचेंहि बंड पुढच्या काळींच उद्भवलें असावें. भगवद्गीतेंतील ‘स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेSपि यान्ति परागतिम्’ ह्या वाक्यावरून हें बंड त्या काळींच माजलें होतें असें दिसतें, म्हणजे ब्राह्मण व क्षत्रिय ह्या दोनच वर्णांचा शिरजोरपणा चालून शूद्रांना व आर्य वैश्यांनाच नव्हे तर ब्राह्मण-क्षत्रियांच्या स्त्रियांना देखील धर्माच्या दृष्टीनें हीन लेखण्यांत येत होतें, असें दिसतें. एरव्हीं गीतेंतल्या सुधारक धर्मानें ‘तेSपि यान्ति परागतिम्’ अशी थोरवी गाइली नसती. तात्पर्य इतकेंच, आर्यांचें कर्मकांड आणि कांहीं अशीं क्षत्रियांनीं उभें केलेलें ज्ञानकांडहि ब्राह्मण म्हणविणा-यांनीं आपलेंसें केल्यावर क्षत्रियांनीं, विशेषतः मथुरेकडचे सात्वतपुत्र ऊर्फ कृष्णायन, कपिलवस्तूचे शाक्यपुत्र ऊर्फ बौद्ध, वैशालीचे नाथपुत्र ऊर्फ (लाट) ह्यांनीं आपला भक्तिमार्ग ऊर्फ भागवत धर्म वैदिक धर्मांचे बंडाला तोंड देण्याकरितां निरनिराळ्या ठिकाणीं आणि वेळीं संस्थापिला. ह्यांपैकीं सात्वत अथवा भागवत धर्म हा मुळांत श्वेताश्वेतरोपनिषदाचे काळापर्यंत शैव आणि शाक्त मतवादी होता; तो पुढें गीतेच्या उत्तर काळीं वैष्णव संप्रदायी बनला. शैव-वैष्णव आणि बौद्ध-जैन व इतर लहानसान संप्रदाय पूर्वींसारखेच वेदबाह्य होते. निदान ते सर्व ब्राह्मणांना व कांहीं जुन्या मतांच्या क्षत्रियांना सारखेच तिरस्करणीय वाटत होते; कारण काय तर त्यांचा वेदांशीं संबंध नव्हता. त्या सर्वांना भागवत हें सामान्य नांव होतें. गुरुपूजा आणि त्या गुरूंची अथवा देवादिकांची मूर्ति, देवळें वगैरे पार्थिव साधनांच्या द्वारा भक्ति करण्याचा प्रघात शैवमतांत होता. त्यांच्या संसर्गानें प्रथम बौद्ध-जैनांमध्यें आणि नंतर त्यांच्या द्वारां वैष्णव संप्रदायांत हा प्रघात फारच बोकाळला. ही गुरुपूजा अथवा देवादिकांची पार्थिव पूजा आर्यांच्या अस्सल वैदिक धर्माला प्रथम मुळींच पसंत नव्हती. पण अस्सल आर्यवैदिक धर्म प्रथम बाहेरून आलेल्या मूठभर परकीयांचा होता. येथें भरतखंडांत असणा-या सुसंकृत अथवा असंस्कृत आर्येतरांमध्यें ब-यावाईट त-हेची ही गुरुभक्ति उर्फ श्रमणपूजा (Shramanism) पुरातन काळापासून चालत आलेली आहे. ह्या प्राकृत आर्येतरांच्या प्रागैतिहासिक धर्माची सुधारणा ज्या धर्मानें ऐतिहासिक काळांत केली, त्यालाच मीं ह्या व्याख्यानांतून ‘भागवत’ हें नांव दिलें आहे. ह्या धर्माचा मूळ संस्थापक जरी वासुदेव कृष्ण होता असे अंधुक पुरावे सांपडतात तरी खरे आणि उज्ज्वल संस्थापक भगवान् गौतम बुद्ध आणि महावीर वर्धमान जिन हेच होते, असा भरभक्कम ऐतिहासिक पुरावा आहे.

भावी सुधारणा

ह्या परिषदेच्या गेल्या सात बैठकींत माझे मित्र श्री. न. चिं. केळकर ह्यांनीं दोनदां, श्री. अनंत विनायक पटवर्धन ह्यांनीं दोनदां, श्री. ल. ब. भोपटकर, श्री. चिं. वि. वैद्य आणि श्री. गणपतराव अभ्यंकर एकेकदां असें पांचजणांनीं अनुक्रमें अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्या अमूल्य विचारांचा व अनुभवाचा फायदा दिला आहे. त्यांत मी काय भर घालणार? ही सर्व मंडळी संस्थानाबाहेरची होती, तसाच मीहि आहें. प्रत्यक्ष आंतील जुलुमांची कळ किंवा सालासाल खरी झीज सोसून काम करण्याची जबाबदारी आम्हांपैकीं कोणासच नाहीं. ह्या परिषदेशिवाय सुधागड तालुका परिषद म्हणून एक निराळी परिषद भरत असते असें मीं ऐकलें. इतकेंच नव्हे तर श्रीयुत गणेश भास्कर साने बी. ए. एलएल. बी. सुधागड तालुका सभेच्या ५ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सदगृहस्थ मला समक्ष भेटून, त्यांनीं आपलें छापील भाषण मला दिलें, व कांहीं माहितीहि सांगितली. हे गृहस्थ ह्या संस्थानचीच प्रजा आहेत. ह्यांनीं आपल्या भाषणांत जी रडकथा गायली आहे ती हृदयविदारक आहे. विशेषतः सडका ह्या मथळ्याखालीं ह्यांनीं जो टाहो फोडला आहे, त्यामुळें तर सचीवशाहीच्या कीर्तिरूपी गालावर कायमचा डाग लागला आहे ! सचीवशाहीचा हा सांवळागोंधळ पाहून मला एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते, ती ही कीं अखिल भोर परिषदेस अध्यक्ष आणावयाचे ते बाहेरूनच आणणें आवश्यक आहे. कारण त्यांच्या तरी कण्हण्यानें भोरकरांच्या मुक्या वेदनांना वाचा फुटेल, आणि महाराष्ट्राच्या पाठीचा कणा जो सह्याद्रि, त्याच्याच प्रत्यक्ष मणक्या मणक्यामधून जुलमी क्षयाचे जंतु कसे बिनबोभाट चरत आहेत, हें महाराष्ट्राला कळेल ! बाहेरच्यांनीं अध्यक्ष होण्याचें दुसरें एक कारण असें आहे कीं, संस्थानी मुलूख आणि खालसा मुलूख असे हिंदुस्थान देशाचे भेद ह्याउपर उरणार नाहींत. संस्थानी प्रजेस आतां काँग्रेसचे सभासद होतां येतें. संस्थानांत काँग्रेस कमिट्या काम करीत आहेत. फार काय, गोलमेज म्हणून जें नवीन एक सत्र गेल्या वर्षापासून पेट घेत आहे, त्यांत होय नाहीं म्हणतां म्हणतां मोठमोठे हिज हायनेस आणि हिज एक्साल्टेड हायनेसरूपी सर्प जाऊन आदळले आहेत; इतकेंच नव्हे, महात्मा गांधींसारखे अनत्याचारी आस्तिकहि ह्या सत्राच्या दारीं जाऊन भिडले आहेत ! ह्या उकड हंडींतून कोण किती करपून निघेल कीं कच्चा निघेल किंवा शिजून निघेल हें पाहण्यास वेळ लागणार नाहीं. ह्या मंथनांतून फेडरल हिंदुस्थान नांवाचें जें एक पंधरावें रत्न बाहेर पडलें आहे, ती एक अशी अजब वल्ली आहे, कीं ती विष आहे कीं अमृत आहे हें कोडें मोठमोठ्या रसायनशास्त्रज्ञांनाहि अद्यापि कळेना ! तें कसेंहि असो, हिंदुस्थानाचा जवळ जवळ चौथा हिस्सा संस्थानी अमलाच्या अंधारी तळघरांत बेपत्ता खितपत पडला आहे. ही घोडचूक आजवर जरी हिंदी पुढा-यांच्या डोळ्यांवर आली नव्हती, तरी आतां ती तशीच राहील असें मात्र घडणार नाहीं.
कराची येथील काँग्रेसचे वेळीं संस्थानी चळवळीचे पुढा-यांनीं महात्मा गांधी ह्यांचेकडे डेप्युटेशन नेलें, तरी काँग्रेसनें आपल्या उघड ठरावाच्या रूपानें संस्थानी प्रजेची दाद घेतली नाहीं, ही गोष्ट माझ्या दृष्टीनें मोठी निराशेची झाली. त्याचप्रमाणें काँग्रेसच्या खालोखाल हिंदुस्थानांत जे प्रागतिक, हिंदुसभा, मुसलमान, ब्राह्मणेतर, जमीनदार, मजूर, शेतकरी वगैरे पक्ष आणि हितकारी उपपक्ष आहेत ह्यांच्याकडूनहि अद्यापि ह्या संस्थानी तळघरांचा तल्लास घ्यावा तितका मुळींच घेण्यांत येत नाहीं, ही मोठी चीड येणारी गोष्ट आहे खास ! म्हशीचीं शिंगें म्हशीलाच जड झालीं, ह्या न्यायानें प्रत्यक्ष काँग्रेसलाच जर आपलें अंग आपल्यास सावरेनासें झालें आहे, तर तिच्यापेक्षां अधिक लहान व कमी सुसंघटित इतर पक्षांची काय कथा? मला संस्थानी प्रजेचा म्हणून आतां एक निराळाच राष्ट्रीय पक्ष ताबडतोब घडविण्यांत यावा असें वाटूं लागलें आहे. अखिल भारतीय संस्थानी प्रजापरिषद लवकरच भरविण्यांत येणार आहे, तिलाच भोरसारख्या इतर लहानसान परिषदांनीं संलग्न होऊन जबाबदारीपूर्वक आपली बाजू संभाळावी हें अवश्य आहे. परवां पुण्यास अखिल ब्राह्मणेतर पक्षामार्फत जेधे मॅन्शनमध्यें एक महत्त्वाची सभा भरली होती. तेव्हां अखिल भारतीय ब्राह्मणेतर पुढा-यांनीं आतां संस्थानी प्रजेसंबंधानें निदान आपलें धोरण तरी काय आहे हें बिनचूक भाषेंत प्रसिद्ध करावें असा मीं आग्रह धरला. पण महात्माजींसारख्यांनीं ज्या हतभागी लोकांची निराशा केली, त्यांची दाद ब्राह्मणेतरांच्या मानलेल्या पुढा-यांना कशी घेतां येणार? म्हणून त्यांनीं नकार दिल्यामुळें मला विशेष वाईट वाटलें नाहीं ! मला वाटतें, संस्थानी प्रजेनें आतां  दुस-यांच्या तोंडाकडे पाहात न बसतां आपली येथून पुढची वाट आपणच सुधारावी. ह्या मार्गांत कांहीं अडचणी आहेत. त्यांचा थोडक्यांत उल्लेख करितों. कस्टमचें उत्पन्न संस्थानिक मागूं लागले म्हणजे खालसांतले स्वराज्यवादी तोंडें कशीं वळवतील, हा एक कूट प्रश्नच आहेत. कस्टम म्हणजे जकातीच्या उत्पन्नाचें नवीन घबाड संस्थानिकांना मिळाल्यावर तें उत्पन्न प्रजेच्या आहारीं जाईल कीं त्याचा लय महाराजांचे नवे बंगले आणि नोकरशाहीचे वाढते पगारांतच होईल हें कोणीं सांगावें? शिवाय संस्थानें आणि खालसा ह्यांत दुस-या अनेक गोष्टींसंबंधीं हेवादावा माजण्याचा संभव आहे. उदाहरणार्थ, भाटघर तलावाचें उदाहरण घ्या. शहाजहानानें ज्याप्रमाणें २०,००० मजुरांची वेठ धरून त्यांच्या रक्तानें ताजमहाल २२ वर्षांत बांधला आणि तोच शहाजहान आता जगाच्या कोडकौतुकाला पात्र झाला आहे, त्याचप्रमाणें पंतसचीवहि आपल्या गरीब रयतेची जमीन बिनदर्याफ्त खालसा मुलखाच्या कल्याणाकरितां बहाल करून साम्राज्य सरकाराकडून नऊ तोफांची सलामी मिळवून बसले आहेत ! भाटघरचें काँपेन्सेशन प्रकरण पुनः विचाराकरितां निघालें व पुरेंपुरें काँपेन्सेशन खालसांतील प्रजेनें द्यावें असें ठरल्यास किती वाद माजेल ! सबंध दक्षिणेंत अलीकडे पाऊस फार कमी पडत आहे. उद्यां जर स्वराज्यांतील काँग्रेसनें ठरविलें कीं सह्याद्रीचा सर्व घाटमाथा दक्षिण हिंदुस्थानाच्या कल्याणाकरितां जंगल म्हणून राखून ठेवण्यांत यावा, आणि भोरपासून खालीं थेट त्रावणकोरच्या हद्दींतील घाटमाथ्यावरच्या सर्व शेतक-यांची थारेपालट करावी, मग काय हाहाःकार उडेल !
असो. ह्या भावी अडचणी केवळ काल्पनिक आहेत. त्यांना भिऊन संस्थानी प्रजेनें खालसांतल्या प्रजेशीं सहकार्य करण्याचें आतां लांबणीवर टाकूं नये आणि उलट पक्षीं खालसांतील पुढा-यांनीं आपल्याच कामांत गुंतून – मग तीं कितीहि अवजड असोत, संस्थानी प्रजेची इतःपर हेटाळणीहि करूं नये, येवढेंच मला सुचवावयाचें आहे.
स्थानिक अडचणी आणि गा-हाणीं ह्यांचा विचार ठराव करतांना ते ते वक्ते पुढें आणतीलच. संस्थानांत तूर्त सनदशीर रीतीनेंच चळवळ व्हावी असें काँग्रेसचें व व्यक्तिशः महात्माजींचें धोरण आहे. तेंच योग्य आहे. कायदेभंगांचा जेथें जेथें प्रसंग संस्थानिक आपण होऊनच आपणावर ओढून घेतील तेथें काँग्रेसला अगर खालसांतील पुढा-यांना स्थानिक लढाईंत प्रत्यक्ष भाग घेतां येणार नाहीं. पण त्यांची सहानुभूति मात्र अलबत प्रजेच्याच बाजूनें असणार हें उघड आहे. खालसांतल्या कायदेभंगांत कांहीं संस्थानी प्रजेनें व्यक्तिशः भाग घेऊन खालसा प्रजेला ऋणी केलें, तसें खालसांतील कांहीं कर्मवीरांनीं, संस्थानी प्रजेला कर्जफेड करावयाची असल्यास तें त्यांचें व्यक्तिशः पाहणें आहे. त्यांचा प्रतिबंध काँग्रेसला तरी कसा करतां येईल? पण असा प्रसंग न यावा म्हणून वेळींच समजूत घेऊन संस्थानिकांनीं सनदशीर प्रयत्नांत आपल्या प्रजेशीं आपण होऊन सहकार्य करावें, किंवा निदान त्या कामांत सहकार्य करण्यास पुढें आलेल्या खालसांतील पुढा-यांशीं आडमूठपणें तंडत बसूं नये, एवढाच फार तर काँग्रेस दोहोंपक्षीं सल्ला देईल.
नुकतेंच, सर मनुभाई मेथा ह्यांनीं बिकानेरचे दिवाणपदावरून बोलतांना, संस्थानी प्रजेला मूलभूत हक्क बहाल करण्यांत संस्थानिकांच्या अस्तित्वाला मोठा धोका पोंचणार आहे, अशी हांकाटी केली आहे ! दौमेंत्र्यान्नृपतिविनश्यति. ज्या घाशीराम कोतवालानें पेशवाई बुडविली, त्याच कोटींतील सर मनुभाई हे एक आजकालचे घाशीराम दिसतात. अशा घाशीरामापासून सचीवशाही तरी सुरक्षित राहो, अशी आमची ईश्वराजवळ प्रार्थना आहे.

भागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले)

व्याख्यान पहिलें
पुणें येथें एकनाथषष्ठीनिमित्त रा. शिंदे ह्यांनीं वरील विषयाच्या प्रस्तावनेदाखल प्रवचन केलें, तेव्हां ठाण्याचें प. लो. वा. भावे ह्यांच्या महाराष्ट्र सारस्वत ह्या पुस्तकांतील एकनाथासंबंधीं प्रकरण वाचून भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म हें कोडे किंचित् उलगडण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. भागवतधर्माचा राजकारणाशीं उगाच संबंध लावून न्या.रानडे ह्यांनीं ही वावटळ उठविली होती. मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष ह्या पुस्तकांत रानड्यांनीं ही देशाभिमानाची धूळ उठविली, आणि ती एकनाथांच्या भागवतधर्मावर व्याख्यानें देऊन त्यांनीं जी पसरविली ती महाराष्ट्राच्या चिदाकाशांत अद्याप उसळत आहे. महाराष्ट्रधर्म श्रीशिवरायांनीं स्थापिला, श्रीरामदासांनीं त्यांचा कैवार घेतला. पण निदान महिपतीच्या कालापर्यंत कोणाहि जीवन्मुक्त वारक-यानें भागवतधर्माची परिणती राजकारणी महाराष्ट्रधर्मांत होते, अशी ग्वाही दिली नाहीं. ती त्याची दिशाच नव्हती. रा. भावे ह्यांचे उतारे वाचून दाखवून, रा. भावे ह्यांनीं भागवतधर्माची व महाराष्ट्रधर्माची सांगड घालून अव्यापार केला आहे, असें रा. शिंदे ह्यांनीं आपलें मत दिलें. भावे म्हणतात कीं “भागवतधर्म मऊ आहे, पण त्याच्यांत बुद्ध, जैन, महंमदी वगैरेंसारख्या धर्मांशीं झगडून त्यांना हटविण्याचें सामर्थ्य आहे.” (पान २२६) पुढें ह्या दुग्धरसाचा उत्तम मेवा बनवून, महंमदी धर्मानें उच्छेद मांडला असतां, एकनाथांनीं त्याचा रतीब महाराष्ट्राला लावला, आणि त्याला आपल्या काळजाचा उबारा देऊन त्यांत हालचाल सुरू केली. पुढें ह्याचाच आणखी इतर रसायनांशीं मिलाफ करून श्रीसमर्थ रामदासांनीं महाराष्ट्रधर्म बनवला. (पान २२७) उत्तरेकडून महंमदी वारें जोरानें वाहत होतें, तसे इतर दिशांनींहि महाराष्ट्रधर्माला विघातक असें वारें वाहूं लागलें होतें. जैनांच्या पोटांतून निघालेला लिंगायत धर्म, कबीरपंथ, दादूपंथ वगैरेंनीं महाराष्ट्राच्या चातुर्वर्ण्यप्रमुख आचारांवर व विचारांवर सारखे आघात मांडले होते. मानभावपंथानेंहि हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. स्वराज्य तर पूर्वींच लयास गेलें होतें व आतां स्वधर्मालाहि राजयक्ष्मा लागल्याचीं चिन्हें दिसूं लागलीं होतीं. स्वभाषाहि खालावत चालली होती. (पान २४०-४१) वगैरे “स्व” ची आपत्ति दाखवून, त्यावर तोडगा म्हणून एकनाथांनीं आपला भागवतधर्म निरूपिला, असा रा. भावे यांचा भाव आहे. हा भाव प्रत्यक्ष एकनाथांना तरी मान्य होईल कीं नाहीं, याविषयीं रा. शिंद्यांनीं आपली शंका प्रदर्शित केली. भागवतधर्म ऐहिक व्यवहाराचें महत्त्व जाणत आहे, तो केवळ पारलौकिक अतिरेकांत कधींच तृप्त नसतो. ऐहिक परोपकाराच्या सात्त्विक प्रेमाला भागवतधर्म कधीं कोठेंच पारखा नाहीं. उलट त्याचा तो आत्माच आहे. पण भावे सांगतात तसल्या “स्व”च्या दुर्गंधीची भागवतधर्माला कधींच बाधा घडत नाहीं. हें पाहण्यास दूर जावयास नको. महाराष्ट्रधर्मी भावे आणि भागवतधर्मी महिपति यांचीं काव्यें एकमेकांजवळ ठेवून निरखून पाहिल्यास दोहोंची तफावत सामान्य माणसालाहि तत्काळ पटण्यासारखी आहे, अशी शिंदे ह्यांनीं साक्ष दिली.
आपण स्वतः महाराष्ट्रधर्माच्या उलट नसूनहि त्याची बाधा मात्र भागवतधर्माला घडूं देण्यास तयार नसल्याचे शिंद्यांनीं सांगितलें, इतकेंच नव्हे, तर जसजसा ह्या स्वाभिमानी महाराष्ट्रधर्माचा शाब्दिक सुकाळ झाला, तसतसा महाराष्ट्रांतूनच काय पण अखिल हिंदुस्थानांतूनहि भागवतधर्म आपला पाय मागें घेऊं लागला. श्रीएकनाथांनीं जी स्वदेशाची व स्वभाषेची सेवा केली ती स्वाभिमानाला जागा करण्यास केली नसून श्रीज्ञानदेवांनीं कथन केलेला विश्वात्मकभाव जागा करण्यासाठींच केली. कोणाहि सामान्य वारक-यास भागवतधर्माचें वर्म काय म्हणून विचारतां तो चटकन् उत्तर देतो कीं, “कोणाहि जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचें” मग श्रीएकनाथच, रा. भावे ह्यांच्या स्तुतीस भुलून, ह्या विश्वात्मक भागवतधर्माचें आकाश आपल्या महाराष्ट्रधर्माच्या मुठींत दाबून ठेवूं पाहतील काय ? असो.
भागवतधर्माच्या आकाशाला हिंदु-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, स्वपरदेशवाद, इहपरलोकवादाचीं ठिगळें कसल्याहि भोळ्या अगर चलाख हेतूनें चिकटवूं पाहणा-याची निराशाच होणार. ज्या एकनाथ, तुकारामांसारख्यांनीं स्वतःला जिंकलें, त्यांनाहि हल्लींच्या “स्वराज्यवादी” पक्षाला अनुकूल असें व्होट देण्यास लावण्यानें एखाद्याची घटकाभर करमणूक होईल, पण अध्यात्म मार्गांत तिळमात्रहि प्रगति होणार नाहीं, असें सांगून शेवटीं सर्वात्मक भावानें परमात्म्याची प्रार्थना करून रा. शिंद्यांनीं उपासना समाप्त केली.

भागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)

व्याख्यान दुसरें
‘सनातन भागवतधर्माचा विकास’ ह्यावर श्री. शिंदे ह्यांनीं इ. स. १९२५ च्या पावसाळ्यांत पुण्यांत एक व्याख्यानमालिका गुंफली, तिच्या उत्तरार्धाची प्रस्तावना म्हणून हीं दोन प्रवचनें झालीं. त्यांनीं सासवड येथें भागवत धर्माच्या चालू सहस्त्रकांतील हिंदुस्थानांतल्या इतिहासाचें अगदीं संक्षिप्त सिंहावलोकन केलें.
इ. स. च्या १२ व्या शतकांत व-हाडकडे महानुभाव व दक्षिण हैदराबादकडे लिंगायत पंथाची स्थापना झाल्यावर तेराव्या शतकांत पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा उदय झाला. त्यानंतर उत्तरेस वाराणशीस समानंदी, पंजाबांत नानक आणि बंगाल्यांत चैतन्य पंथाची प्रतिष्ठा झाली. वारकरी आणि महानुभाव पंथ लौकिक दृष्ट्या जितका अप्रिय तितकाच दुसरा म्हणजे वारकरी पंथ प्रिय आहे; हा एक मोठाच ऐतिहासिक चमत्कार कां व कसा आहे, तें रा. शिंदे ह्यांनीं स्पष्ट करून सांगितलें. मूर्तिपूजा, जातिभेद, कर्मठ सोवळें वगैरे अधार्मिक गोष्टी दोन्ही पंथांत प्रथम नव्हत्या, तरी पण मागाहून शिरल्या. इतकेंच नव्हे तर धार्मिक वाङ्मयाचा प्रसार मराठींत करण्याचा अग्रमान निःसंशय महानुभावांचा आहे. आणि त्या धर्माचा प्रसार बहुजनसमाजांत करण्याची अपूर्व कामगिरी तो पंथ आजहि करीत आहे, तरी तो अप्रिय आहे; ह्यावरून “जनपदहित” कर्ता ‘द्वेष्यते पार्थिवेंद्रैः’ ह्या म्हणीचा तात्पर्यार्थ म्हणजे डोईजडांचें राजकारण हेंच ह्या चमत्काराच्या तळाशीं असणें संभवनीय आहे, असें रा. शिंद्यांनीं अनुमान केलें.
तुकारामानंतर वारकरी पंथाची आत्मिक वाढ संपली. निळोबांनीं तुकोबाच्या कामगिरीला त्यांची इच्छा नसतां सांप्रदायिक स्वरूप दिलें. ह्यावरून ही वाढ खुंटलेली दिसते. पण ह्या सांप्रदायिकपणामुळेंच ह्या वारकरी पंथाचें व त्यांचें उत्तरेकडील व पूर्वींच्या महानुभावांशीं व्यापारी मात्सर्य वाढून ते एकमेकांचा उलट हेवादेवा करू लागले असावेत, असा शिंद्यांनीं तर्क केला.
महिपतीनें आपला भक्तिविजय ग्रंथ पानिपतच्या लढाईनंतर इ. स. १७६२ सालीं (शकें १६८४ वैशाख वद्य द्वादशीस) प्रवरेच्या दक्षिणेस ताहराबाद येथें प्रसिद्ध केला. महिपतीनें मूर्तिपूजा, वर्णाश्रमधर्म, कर्मठ सोवळेपणा, ब्राह्मण, संस्कृतचें बंड, धार्मिक मध्यस्थांचा जुलूम इत्यादि गोष्टींची उघडउघड निंदा हल्लींच्या सत्यशोधकांहूनहि किती तरी अधिक स्पष्ट व फटकळ भाषेंत केली आहे. त्यावरून तुकारामांच्याहि मागें १०० वर वर्षें ख-या भागवतधर्माची ज्योत अगदींच मावळलेली दिसत नाहीं. अशा प्रकारच्या ह्या भागवतधर्माचें मुख्य कार्य सांगतांना रा. शिंदे म्हणाले, “(१) धर्मभेद, (२) जातिभेद, (३) मूर्तिपूजा, (४) अतिवैराग्य, (५) अतिकर्म, (६) अतिज्ञात, (७) ग्रंथप्रामाण्य, (८) गुरुपुजा, (९) राजकारण, (१०) तर्कवाद, (११) तात्पुरता हितवाद, ह्या ११ बाह्य गोष्टींचा ख-या धर्माशीं घटस्फोट भागवतधर्मानेंच केला.” हें शिंदे ह्यांनीं महिपतीच्या ग्रंथांतील उतारे देऊन सिद्ध केलें. “ज्ञानदेवें घातला पाया | तुका झाला कळस ||” ही वारकरी म्हण कांहीं अंशीं दुरुस्त करण्यासाठीं वारकरी पंथाचा महाराष्ट्रांतच नव्हे तर अखिल हिंदुस्थानांत प्रसार करण्याच्या कामीं श्रीनामदेवांनीं जो भाग उचलला तो श्रीज्ञानदेवांसच काय, पण प्रत्यक्ष श्रीतुकोबांनाहि उचलणें शक्य झालें नाहीं; म्हणूनच नामदेवांचें अवतारकृत्य श्रीतुकोबांनीं आटोपलें, हें महिपतीचें काव्यमय मत यथार्थ आहे, असें शिंदे ह्यांनीं आपलें मत दिलें.
आम्ही वैकुंठवाशी | आलों ह्याच
कारणाशी | बोलीले जे ऋषी |
साच भावें वर्ताया ||

हा तुकारामांचा सात्त्विक दावा हल्लींचा वारकरी अगर तदनुषंगी कोणताहि पंथ किती सिद्ध करीत आहे हा प्रश्न अलाहिदा आहे. मात्र हाच दावा हल्लींचे ब्राह्मसमाज, आर्यसमाज व सत्यशोधक समाज ह्यांचा आहे, असें शिंदे म्हणाले. अगोदरच्या उदार पंथांनीं हा दावा सिद्ध केला असता, तर हे नवीन समाज निघावयाला अवकाशच उरला नसता. पण भागवतधर्माचें क्षेत्र सनातन व सार्वत्रिक असल्यानें, तें पूर्णपणें आक्रमण्याला हे नवे समाज अपुरे पडल्यास कोणी आश्चर्य मानण्याचें कारण नाहीं. जेथें श्रीचक्रधर महानुभाव, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, नानक, कबीर, चैतन्य, राममोहन राय, दयानंद, ज्योतिबा फुले अशांनीं हात टेकले, तेथें पूर्ण यशाचा चंग कोण बांधिल? अहंकाराचा नाश ह्यांतच भक्तीचा विजय आहे. आणि तेथेंच भागवतधर्माची ध्वजा फडकत आहे, असा निर्वाळा देऊन रा. शिंदे ह्यांनीं सासवड येथील प्रवचन आटोपलें.

ब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म
व्याख्यान तिसरें
मूळ ब्राह्म समाज राजा राममोहन रॉय यांनीं कलकत्त्यास इ. स. १८२८ सालीं स्थापन केला. त्याचा शवसांवत्सरिक उत्सव सर्व हिंदुस्थानभर येत्या ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. ब्राह्म समाजाची स्थापना अनेक विघ्नांना तोंड देऊन राममोहननीं केली व ते लवकर विलायतेस सन १८३० सालीं गेले व तिकडेच वारले. ह्या निराश्रित अर्भकाची जोपासना पुढें महर्षि देवेंद्रनाथांनीं केली. तसेंच सन १८५८ सालीं पुढें ईश्वरचंद्र सेन ह्या अत्यंत प्रतिभाशाली तिस-या पुढा-याचा लाभ ह्या समाजास घडला.
ह्या वेळीं हिंदुस्थानांत अवघ्या १२ ठिकाणीं ब्राह्म समाजाच्या शाखा होत्या. त्या साधारण ब्राह्म समाज स्थापन झाल्या वर्षीं म्हणजे १८७८ (मे महिन्याच्या १५ तारखेस) सालीं १२४ शाखा हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून व भाषेंतून झाल्या. ह्या तिस-या पुढा-यानें केवळ संख्येच्या दृष्टीनेंच समाजाची अशी असामान्य वाढ केली असें नव्हे, तर त्यानेंच ह्या धार्मिक सुधारणेस हिंदुस्थानांत प्रत्यक्ष सामाजिक जीवनाचें स्वरूप दिलें. त्याच्या वेळीं हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत इतरहि स्वामी रामकृष्ण, दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, म. ज्योतिबा फुले, ज. रानडे, तेलंग इत्यादि धार्मिक व सामाजिक सुधारक होते. पण ते केवळ पुरुषांच्याच सभा करीत आणि त्यांच्याशींच वादविवाद करून सुधारणा घडवूं पाहात, पण केशवचंद्रानें आबालवृद्धांना, बायकापुरुषांना, सुशिक्षितांना फार तर काय, पण स्वकीय परकीयांनाहि हालवून जागें केलें, व त्यांचा ब्राह्म समाज स्थापिला !
मग इतक्या प्रभावशाली पुढा-याच्या उलट साधारण ब्राह्म समाज नांवाची अधिक विकसित स्वरूपाची ब्राह्म समाजाची तिसरी आवृत्ति कां काढावी लागली? हा मोठा चित्ताकर्षक प्रश्न आहे खरा ! कोणत्याहि चळवळीच्या आरंभीं एकाच प्रेरित विभूतीचें प्राधान्य असतें. तसेंच ब्राह्म समाजाच्या पहिल्या ५० वर्षांत बहुतेक एकतंत्रीपणाच होता. मग त्या एकतंत्राचें अधिष्ठान राजा राममोहन राय असो, देवेंद्रनाथ असो, किंवा केशवचंद्र असो, एका धीरोदात्त व्यक्तीनें हालवावें, व इतरांनीं हालावें, असा प्रकार होता. पण ब्राह्म समाज ही प्रधानतः स्वातंत्र्यजनक संस्था होती. अर्थात ह्या ५० वर्षांत ब्राह्म समाजांतच नव्हें, तर अखिल भारतांत धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विचाराच्या स्वातंत्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती. ह्या पूर्वतयारीचें श्रेय राममहोन, देवेंद्र आणि केशवचंद्र आणि त्यांच्या प्रभावळींतील निकट अनुयायांस देणें अवश्य आहे. पण ५० वर्षांनंतर ह्या स्वातंत्र्योन्मुख चळवळीचीं सर्व सूत्रें एकाच हातांत राहणें शक्य नव्हतें. मग तो हात कितीहि पराक्रमी असो, कीं पूज्य असो, कीं पवित्र असो ! वर वर पाहणा-यांस साधारण ब्राह्म समाजाची स्थापना कुचबिहारच्या लग्नाच्या वादामुळें झाली, असें वाटणें साहजिक आहे, पण तें चुकीचें आहे. केशवचंद्रांना ब्राह्मवधूचें वय किमान पक्षीं १४ वर्षांचें असावें, असा आपणच सरकारी कायदा पास करून घेतला आणि स्वतःचीच मुलगी कुचबिहारच्या तरुण राजकुमाराला दिली. तिचें वय १४ वर्षांहून किंचित कमी आणि राजकुमाराचें वय १८ वर्षांहून कमी होतें, म्हणून घनघोर वाद उपस्थित झाला. इतकेंच नव्हे तर त्यामुळेंच त्यांच्या अनेक प्रिय अनुयायांनीं त्यांचें पुढारीपण झुगारून देऊन आपली ब्राह्म समाजाची निराळी शाखा काढली हें खरें, परंतु ही लढाई केवळ व्यक्तींची नसून तत्त्वांची होती. मताप्रमाणें वागणूक झालीच पाहिजे पण ती व्यक्ति कर्तूम् अकर्तूम् अन्यथा कर्तूम् समर्थ केशवचंद्र झाली म्हणून काय झालें? प्रश्न केवळ ब्राह्म मताचाच नव्हता, तर त्याच्या अनुष्ठानाचा होता. शिवाय आतांपर्यंत समाजाचें कार्य केवळ भावना आणि प्रेरणा ह्या दैवी तत्त्वांवरच चाललें होतें. सर्वांचीं मतें घेऊन युक्तायुक्ततेचा विचार करून एखादी कार्यपद्धतीची सनद आंखण्यांत आली नव्हती. त्यामुळें ह्या पदाला अत्यंत तीव्र व कडू स्वरूप आलें. आणि शेवटीं स्वातंत्र्य तत्त्वाचें शरीर जो सनदशीरपणा त्याचाच विजय झाला. आणि कलकत्त्याच्या टौन हॉलमध्यें प्रचंड जाहीर सभा भरून केशवचंद्रांच्या विरुद्ध साधारण ब्राह्म समाजाची जोरदार स्थापना झाली ! त्या गोष्टीला आज ५० वर्षें झालीं !
ह्यानंतर ब्राह्म समाजांत स्त्रिया, तरुण, लहान मुलें, वृद्ध, विद्वान, गृहस्थ आणि कामकरीवर्ग ह्या सर्वांचा समान दर्जानें कसा प्रातिनिधिक तत्त्वानें समावेश होऊं लागला आणि हिंदुस्थानभर ह्याच शाखेचा विस्तार केशवचंद्रांच्या नवविधान नांवाच्या शाखेहूनहि कसा अधिक झाला, ह्याचें सविस्तर वर्णन श्री. अण्णासाहेबांनीं केलें. नंतर ते म्हणाले कीं, ब्राह्म समाज व बौद्ध धर्म ह्यांत एक फरक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. ब्राह्म धर्मांत मनुष्यजातीच्या सर्व धर्मपंथांचा समन्वय होतो, ही गोष्ट खोटी नाहीं. अर्थात् ब्राह्म धर्म म्हणून एक निराळा नवाच धर्म आहे, असें मुळींच नव्हे. पण बहुतेक जुने धर्म पंथ – विशेषतः बौद्ध धर्म हा व्यक्तिविशिष्ट स्वरूपाचा आहे. बौद्ध धर्माचाहि संघ प्रत्यक्ष सिद्धार्थाच्या काळापासून पुरातन आहे. तरी हा बौद्धसंघ म्हणजे केवळ भिक्षुसंघच म्हणजे केवळ संन्याशांचा संघच होता. गृहस्थाश्रमालाच मुळीं बौद्ध धर्मांत गौणस्थान आहे. मग धर्माच्या कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाकडे ह्या धर्मांत दुर्लक्ष्य झाल्यास नवल काय? आदले दिवशीं प्रत्यक्ष धर्मानंद कोसंबी ह्यांनींच बौद्ध धर्माची अवनति कां झाली, ह्याचीं कारणें सांगतांना स्पष्ट एक कारण असें सांगितलें कीं बौद्ध भिक्षू व प्रत्यक्ष गौतमबुद्धानेंहि जातिभेदाच्या मुळावर कितीहि आघात केले तरी, बौद्ध गृहस्थाश्रमीयांनीं हिंदुस्थानांत तरी ह्या जातिभेदाचें निरसन करावें तितकें केलें नाहीं, म्हणून शेवटीं चार वर्णांच्या आतां चार हजारांवर जातींची आणि असंख्य पोटजातींची बजबजपुरी आज ह्या अभागी देशांत माजली आहे. ब्राह्म धर्माचें स्वरूप आणि कार्य ह्याचें उलट आहे. ह्या धर्मांत जगद्गुरु तर नाहींच पण उलट साध्या पुरोहिताचेंहि बंड नाहीं. ज्याचा तोच पुरोहित. धर्माच्या सर्व तत्त्वांना सामाजिक प्रत्यक्ष स्वरूप यावयाचें झाल्यास केशवचंद्रांसारख्या प्रतिभाशाली गुरूलाहि केवळ त्यांच्या आसनावरून खालीं आणावें लागतें; इतकेंच नव्हे तर आपल्या घरांतील मावशीबाई व आजीबाई, तरुण बाबू आणि लहान बेबी ह्यांचेंहि सहकार्य सामाजिक अनुष्ठानांत साधावें लागतें. हें शेवटचें काम अत्यंत कठीण आहे. आणि ह्याशिवाय तर कोणतीहि शुद्धि अथवा कसलेंहि संघटन होणें केवळ अशक्य आहे. हा सामाजिक स्वर्ग जर कोणी गेल्या शतकांत ह्या पृथ्वीवर आणिला असेल, तर तो एका साधारण ब्राह्म समाजानेंच, ह्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं.
बौद्ध धर्माविषयीं श्री. अण्णासाहेबांचा अलोट आदर आहे. आजकाल त्यांचें लक्ष्य बहुतेक बुद्धाच्या ध्येयाकडे गुंतलें आहे, असें त्यांनींच स्पष्ट सांगितलें. आणि ते म्हणाले कीं, ध्येय सामाजिक स्वरूपांत आणावयाचें झाल्यास, पंडित शिवनाथशास्त्री, विजयकृष्ण गोस्वामी, नवद्वीपचंद्रदास अशाच आधुनिक भिक्षूंची जरूरी आहे आणि त्यांनीं झालें तरी शहरांतल्या अर्धवट सुशिक्षितांपेक्षां बहुजनसमाजांतल्या बायकामुलांचेंच साहाय्य संपादिलें पाहिजे. येरवीं जेथें बौद्ध धर्माची अवनति झाली तेथें नवशिक्या ब्राह्म समाजाची काय कथा?

भागवत पुराण

भरतखंडांत भागवत धर्माला पूर्ण खग्रास ग्रहण लागलें असतां ‘श्रीमद्भागवतपुराण’ हा एक प्रासादिक ग्रंथ निर्माण झाला. हें सुंदर पुराण संस्कृतांत आहे. ह्याचा काळनिर्णय अद्यापि झाला नाहीं. कोणी म्हणतात, देवगिरीच्या रामदेवराव जाधव राजाच्या पदरीं बोपदेव नांवाचा एक वैय्याकरणी पंडित होता, त्यानें हें केलें. हें पण खरें नसावें. कारण ज्या अर्थीं त्याच्यापूर्वीं वीर वैष्णव मध्वाचार्य होऊन गेले आणि त्यांनीं “भागवतसार” नांवाचा लहानसा ग्रंथ ह्या पुराणाचें सार म्हणून केला, त्या अर्थीं ‘श्रीमद्भागवत’ हा ग्रंथ मध्वाच्या पूर्वींच प्रसिद्ध असला पाहिजे. प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार आल्बेरूनी ह्यानें आपला इतिहास इ. स. १०३० चे पूर्वीं संपविला. विष्णुपुराणांत ज्या १८ पुराणांची यादी आहे, त्यांत श्रीमद्भागवताची गणना आहे, असें आल्बेरुनी ह्यांनीं लिहिलें आहे, ह्यावरून ‘श्रीमद्भागवत’ पुराण निदान इ. स. ९०० अगर फार तर १००० वर्षांच्या सुमारास झालें असावें, असा डॉ. फारकुहार ह्यांचा अदमास आहे. (Religious Literature of India, p. 232). ह्या पुराणाच्या ११ व्या स्कंधाच्या ५ व्या अध्यायांतील खालील श्लोक प्रसिद्ध आहेत. “कृतादिषु प्रजा राजन् कलो इच्छन्ति संभवम् | कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायण: ||३८|| क्वचित् क्वचित् महाराज द्रविडेषुच भूरिश:| ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी ||३९|| कावेरी च महापुण्या प्रतीचीच महानदी | ये पिबन्ति जलं तासां मनुजा मनुजेश्वर | प्रायो भक्ता भगवति वासुदेवेSमलाशय: ||४०||” ह्या श्लोकांत ताम्रपर्णी, कृतमाला, कावेरी, प्रतीची आणि महानदी इतक्या नद्यांचा उल्लेख आहे; आणि ह्या नद्यांचें पाणी पिणा-या द्राविडांमध्यें कलियुगांत नारायणपरायण महाभागवत भूरिश: म्हणजे पुष्कळ होतील, असें भविष्यवजा सांगितलें आहे. ह्यावरून त्या काळीं ओरिसापासून खालीं दक्षिणेकडील सर्व दक्षिणेकडील सर्व देश द्राविड अशाच नांवानें ओळखिला जात असावा व ह्याच देशांत हें पुराणहि झालें असावें. अलीकडचा भक्तिमार्गहि ह्याच द्राविड देशांत प्रथम उद्यास आला; असा ह्या श्लोकांचा भावार्थ आहे. “भागवतमाहात्म्य” म्हणून एक नंतर झालेला लहानसा संस्कृत ग्रंथ भागवताला पुरवणीवजा जोडला आहे. त्यांत ‘भक्ति’ ह्या नांवाची एक तरुण स्त्री नारदाला भेटली, ‘ज्ञान’ व ‘वैराग्य’ हीं तिचीं दोन्हीं मुलें होतीं; कलियुगांत त्यांचे हाल झाल्यामुळें अतिशय कृश झालीं होती; वगैरे कथा आहे. येणेंप्रमाणें हा ग्रंथ म्हणजे एक लहानसें गोड रूपक आहे. हें रूपक पद्मपुराणाच्या उत्तरखंडांतील एक भाग आहे, असें म्हटलें आहे त्याचें तात्पर्य हेंच कीं, ज्ञानवैराग्ययुक्त भक्ति हें भागवत पुराण वाचल्यानेंच प्राप्त होतें. अशी ही उत्कट भक्ति, जी वेदकाळीं नव्हती, गीताकाळीं नव्हती, किंबहुना भागवत पुराण निर्माण होण्यापूर्वीं केव्हांहि नव्हती, त्या भक्तीनें ह्या रूपक ग्रंथांत आपली पूर्वपीठिका आणि विकास यांचा इतिहास पुढील मार्मिक शब्दांत सांगितला आहे. “उत्पन्ना द्राविडा साSहं वृद्धिं कर्णाटके गता | क्वचित् क्वचित् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता” ||४८|| अध्याय १ ला. अर्थ :- मी (भक्ति) द्राविड देशांत जन्मलें, कर्नाटकांत व महाराष्ट्राच्या कांहीं भागांत वाढलें, आणि गुजराथेंत म्हतारी झालें. हें रूपक अगदीं यथार्थ आहे. मेलेल्या भागवत धर्माला पुनर्जन्म देणारा आधुनिक भक्तिमार्ग हा खरोखरीच प्रथम तामिळ देशांत उदयास आला. तेथून कर्नाटकांतून लवकरच महाराष्ट्रांतील पंढरपुरांत आला. हें म्हणणें इतिहासाला अगदीं धरून आहे.

  1. भागवत धर्माचा पाया
  2. भागवत धर्म विकास
  3. भागवत धर्म
  4. भविष्य
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
Page 68 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी