1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

जैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी

रा. राजवाडे ह्यांनीं मराठ्यांविरुद्ध आगळीक करून एकाच जातींत दुही माजविण्याचें पुण्य कसें संपादन केलें आहे, हें मागच्या अंकीं दाखविलें. आतां त्यांनीं “सनातन” म्हणविणा-या हल्लींच्या धेडगुजरी हिंदु धर्माचे आपण सर्वाधिकारी आहों अशी स्वत:ची भ्रामक कल्पना करून घेऊन, तीच आपल्या भाळ्या भोळ्या वाचक अनुयायांत पसरविण्याचा उपद्व्याप ह्या लांबट प्रस्तावनेंत कसा चालविला आहे हें या अंकीं सांगावयाचें आहे. मराठ्यांविरुद्ध लिहितांना मनाची नसली तरी जनाची लाज ठेवावी लागतेच. कारण, मराठे पडले अर्वाच्य शस्त्रधारी. ते हीन असोत उत्तम असोत, नाकें मुरडीत कां होईना, त्यांना क्षत्रिय म्हटल्याशिवाय आपली पोळी पिकत नाहीं, अशी कांहीं “संशोधकांची” समजूत झालेली दिसते. पण ह्या पोळीचा व ख-या सत्यशोधनाचा कांहीं संबंध नाहीं, अशी आमची नम्र बुद्धि झाली आहे. लोकायतीक, जैन, बौद्ध, लिंगायत इत्यादि स्मृतिशेष अथवा हल्लीं हयात पण अशस्त्रधारी वैश्य जातीविषयीं आणि धर्माविषयीं खरीं खोटीं मतें पसरवितांना ह्या “संशोधकाची” लेखणी अगदींच बेलगामी होते. परंतु जोंपर्यंत आम्हांला सत्यावरच दृष्टि ठेवावयाची आहे, तोंपर्यंत मराठे-ते आर्य असोत नसोत, त्यांना कोणी धूर्त क्षत्रिय म्हणोत किंवा शूद्र म्हणोत - कोण आहेत हें आम्हांला ख-या इतिहासांतच पाहिलें पाहिजे. जोंपर्यंत ब्राह्मणांना तो इतिहास कळत नाहीं. किंवा कळूनहि पोटासाठीं ते तो निराळे भासवीत आहेत तोंपर्यंत मराठ्यांनीं आपणच आपलें मूळ शोधणें उचित आहे; व तसा अल्प प्रयत्न मागच्या अंकीं झाला.

ह्या अंकांत राजवाड्यांनीं आपल्या लेखणीची भांडकुदळ जैनबौद्धांवर विनाकारण कशी उगारली आहे तें पाहूं. शहाजीचें चरित्र, त्यांत जैनबौद्धांना शिव्या, असें केवळ जाणूनबुजून विषयांतर राजवाडे ह्यांनीं केलें आहे. तें सभ्य शब्दांत केलें असतें, तर त्यांच्या हेतूचा तरी आम्हाला संशय आला नसता. तीहि वाट त्यांनीं मोकळी ठेविली नाहीं. पान १३८-९ व इतर पुष्कळ ठिकाणीं जैन बौद्ध इ. धर्मांना सनातन धर्मांचे द्वेष्टे, असूयक, स्त्रीशूद्रादि ‘हलकट’ जातींत व समाजांत आपलें पाखंड पसरून ब्राह्मण्याचा उच्छेद करणारे, इ. इ. उघड उघड निंदात्मक उद्गार काढिले आहेत, हें फार अयोग्य आहे; “ब्राह्मण म्हटला म्हणजे त्याला देहान्त शिक्षा नाहीं, असा दंडक असल्यामुळें, बिकट प्रसंगीं इतर वर्ण शिक्षा ऊर्फ दंड टाळण्यासाठीं ब्राह्मणाचें सोंग घेत.” (पान १२८) असा इतिहासाचा विपर्यास करून जैन बौद्ध महंतांना त्यांनीं स्पष्ट “सोंगाडे संन्याशी” ठरविलें आहे. इतकेंच नव्हे तर त्यांच्या जुलमाला कंटाळून मराठे हे उत्तरेकडून दक्षिणेंत आले, (पान १५८). दक्षिणेंत आल्यावरहि “जैन, लिंगायत, मानभाव, गोरख पंथी इत्यादि नानापाखंडी ह्या लोकांना भुलवीत व हे लोक त्यांच्या भुलविण्याला बळी पडत.......जो कोणी पोटाला देईल मग तो स्वधर्मी असो, विधर्मी असो, त्याची सेवा करण्यास हे नागोत्पन्न मराठे व यजुर्वेदी ब्राह्मण सारखेच तयार असत” (पान१९४) इ. वाक्यांनीं जैन, लिंगायत, मराठे ह्या सर्वांची सारखीच बेअब्रू केली आहे. शेवटच्या ह्या एकाच वाक्यांत राजवाड्यांनीं आपलें चित्पावनी हृद्य उघडें करून, जैन, लिंगायत, मराठे आणि देशस्थ ब्राह्मण ह्यांची थोडक्यांत सांगावयाचें तर अखिल महाराष्ट्राची बदनामी केली आहे. चितपावन हे महाराष्ट्रांत येऊन फार दिवस झाले नाहींत, तोंच आपल्या पोषक मातृभूमीवर कसे व किती उलटूं शकतात, ह्याचें हें एक शहाजोग उदाहरण राजवाड्यांच्या लेखणींतून गळून पडलें आहे, हें महाराष्ट्रानें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. श्रीशहाजीची व भोसले घराण्याची व्यक्तिशः तळी उचलून राजवाड्यांनीं अखिल मराठा जातीविषयीं आपला तिरस्कार व्यक्त करण्याचें धाडस खालील वाक्यांत केलें आहे. “अशा राजकीयदृष्ट्या अर्धवट, लज्जास्पद व अधम स्थिंतींत दक्षिणेंतील नाग महाराष्ट्रिकोत्पन्न मराठे म्हणजेच उत्तरेकडील ऐत्तिरेय ब्राह्मणानें गायिलेल्या भोजक्षत्रियांचे वंशज जे शहाजी राजे भोंसले त्यांनीं यवनाशीं करामतीनें व पराक्रमानें झुंजून स्वराज्याचा पाया घालण्याचा साहसी उपक्रम स्वत:च्या एकट्याच्या हिमतीवर रचिला; आर्य क्षत्रियांचें नांव पुनरपि त्रिभुवनभर गाजविलें, आणि अखिल आर्यांच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला” ! ह्यावरून राजवाड्यांची निष्ठा एका भोसले कुळावर तरी होती, असा कोणी गैरसमज करून घेतील, तर पान १९२ वर भोसले कुळाच्याहि बदनामीचें विष त्यांनीं पुढील वाक्यांत ओकलें आहे. “भोसले हे पंचकुळीच्या बाहेरील मराठ्यांना परमार्थानें संस्कृतीदृष्ट्या कमतर समजत, तर उलट बाहेरील मराठे लोक, भोसले व त्यांची दशकुळी व पंचकुळी ह्यांना रागानें कमअस्सल म्हणून नांवें ठेवीत.” हा बेशरम कुटाळपणा मराठ्यांपुरता येथेंच न थांबवितां भोसले घराण्याचाच धर्म मात्र खरा धर्म, त्यांची संस्कृति तेवढीच उच्च दर्जाची आणि अखिल मराठ्यांचा धर्म व संस्कृति मात्र अत्यंत हीन दर्जाची हें ठरविण्याकरितां त्याच पानावरील पुढच्याच वाक्यांत “एकपक्षाची जैनलिंगायतावर साम्राज्यें चालविण्याची योग्यता, तर दुस-या पक्षाची सामान्य देशमुखीहि टिकविण्याची अयोग्यता; एक चतुरस्त्र विद्येचा भोक्ता; दुसरा विद्येचा पिढीजात शत्रु. एक सनातन धर्माचा व गोब्राह्मणांचा कैवारी, दुसरा भेटेल त्या देवधर्माचा व साळूमाळूचा अनुयायी !” एकंदरींत राजवाडी हृदय म्हणजे विषाचें एक पेंवच कसें होतें, हें ज्यांना पूर्ण ओळखावयाचें असेल त्यांनीं हा अनैतिहासिक प्रस्तावनारूपी उपद्व्याप समग्र मार्मिकपणानें वाचावा अशी आमची शिफारस आहे. आम्ही तरी स्पष्ट म्हणतों कीं, ही संशोधनी प्रस्तावना नव्हे तर एका चितपावनाला वगळून बाकी उरलेल्या अखिल आधुनिक महाराष्ट्राची एकजात शहाजोग बदनामी आहे ! ज्याला जशी सहन होईल तशी होवो !!
जैन बौद्ध हेहि क्षत्रियच होते व मराठेहि क्षत्रियच आहेत, हें राजवाड्यांनाही कबूलच आहे. तेव्हां जैन बौद्ध ह्या स्वकीयांच्या जुलमाला कंटाळून मराठ्यांनीं दक्षिणेंत येणें हें संभवत नाहीं; मुळीं हें खरेंच नाहीं. पारशांप्रमाणें अगर चित्पावनांप्रमाणें मराठे जर महाराष्ट्रांत बाहेरून आले असतील, तर ते निदान कोणाला भिऊन जीव धरून दडून बसण्यासाठीं आले नाहींत. राज्यें आणि साम्राज्येंदेखील चालिवण्यासाठीं आले आहेत. हें मत राजवाड्यांसारख्या उपटसुळाला सहन होत नसलें तरी श्री. चि वि. वैद्यांसारख्या सन्मान्य व जबाबदार इतिहासकाराला मान्य आहे; इतकें पुरे. परंतु हा अंक मराठ्यांना पाठबळ देण्याकरितां आम्ही लिहीत नाहीं. ते ब्राह्मणांना पुरून उरण्यासारखे आहेत. श्री शहाजीच्या चारित्र्याच्या सावलीखालीं बसून राजवाड्यांनीं भारतीय धर्मांचा खोटा इतिहास पसरविण्याचें जें दुकान उघडलें आहे, तें मात्र आम्हांला उघड्या डोळ्यांनीं पाहवत नाहीं. लोकायतिक जैन, बौद्ध, लिंगायत, मानभाव, शीख, इ. वेदबाह्य धर्मांच्या इतिहासाचीं साधनें अद्यापि संग्रहित व्हावयाचीं आहेत. तीं हळूहळू होऊं लागलीं आहेत. त्यांना आपल्या अनैतिहासिक हाताचा स्पर्श करून राजवाड्यांसारख्या ब्राह्मणांनीं विटाळ वाढवूं नये अशी आमची नम्र सूचना आहे. सर्व ब्राह्मणसारखेच अनधिकारी आहेत, असें आमचें म्हणणें नाहीं. विजयनगर कॉलेजचे दोन प्रोफेसर एम्. एस्. रामस्वामी अय्यंगार आणि बी. शेषगिरीराव हे देशस्थ ब्राह्मण आहेत. त्यांनीं गेल्या सालीं “Studies in South Indian Jainism” (दक्षिण हिंदुस्थानांतील जैन धर्माचें अध्ययन) हा आपला स्तुत्य ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. ह्या ग्रंथाचा निष्कर्ष असा स्पष्ट निघत आहे कीं, दक्षिण हिंदुस्थानांतील मध्ययुगीन वाङ्मय, सद्धर्म व सुसंस्कृति ह्यांचें सर्वच नाहीं तरी बहुतेक श्रेय, जैन आणि बौद्ध धर्मांच्या उदार आणि विरक्त प्रचारकांनाच आहे. जैन-बौद्धांचा धर्म आणि संस्कृति हीं आर्य आहेत किंवा अनार्य आहेत हे प्रश्न बाजूस ठेविला, तरी तीं वेदबाह्य आहेत, येवढें निर्विवाद आहे. निदान त्यांना ब्राह्मणी हातांचा विटाळ घडला नाहीं, हें तरी निश्चित आहे म्हणून महाराष्ट्रांतील कांहीं ब्राह्मण म्हणविणा-यांनीं ती साळूमाळूंची संस्कृति, ती सोंगाड्या संन्याशांची वृत्ति, ती नागनरसोबांची कृति असें इतरांना भासवून तिला हेटाळावें, ह्यांत ब्राह्मणी हृदय ओळखून असणा-यांना आश्चर्य वाटण्यासारखे कांहीं नाहीं. आश्चर्य हेंच कीं, विजयनगरचे वरील दोन्ही देशी ब्राह्मण इतिहासकारांनीं जैन-बौद्धांचे सप्रमाण गोडवे गावे आणि आमच्या महाराष्ट्रांतील संशोधकांनीं तिकडे दुर्लक्ष करून त्यांची नुसती कुटाळकी करीत बसावें. आमच्या मतें खरा प्रकार असा आहे.
जैन-बौद्धांचा धर्म व संस्कृति ब्राह्मणांच्याइतकीच जुनी आहे. किंबहुना जैनांची संस्कृति ब्राह्मणांच्याहूनहि फार दिवसांची प्राचीन असावी. आम्हांला ती शुद्ध द्राविड असावी असा जब्बर संशय येऊं लागला आहे. तिचा जन्म उत्तर हिंदुस्थानांत झाला कीं पश्चिम एशियांत झाला, हें ठरविणें तूर्त तरी कठीण आहे. ज्या क्षत्रियानें तिला निर्माण केलें ते हिंदी आर्य कीं पश्चिम आशिआंतील प्राचीन द्राविड होते किंवा मध्य आशियांतील मुद्गल ऊर्फ मोगल होतें हें ठरविण्यास अद्यापि पुरेशीं साधनें उपलब्ध झालीं नाहींत. मूळ पीठिका कशीहि असो, जैव-बौद्धांची वृत्ति ब्राह्मणांप्रमाणें जुलमी, आततायी अथवा अत्याचारी मुळींच नव्हती. उलट त्यांनीं प्राथमिक अवस्थांतल्या व मागासलेल्या दक्षिण हिंदुस्थानांत सात्त्विक धर्म व अत्युच्च संस्कृतीचा अलोट प्रसार केला असतांहि ब्राह्मणांनीं मात्र इ. स. ७०० पासून ९०० वर्षांच्या कालांत त्यांचा कल्पनातीत छळ करून, दक्षिणेंतील राजवटींतून त्यांना घालवून दिलें व त्यांनीं अत्यंत श्रमानें व स्वार्थत्यागानें दळलेल्या संस्कृतीच्या पिठावरच आतां ब्राह्मणी शंकराचार्य चरत आहेत व रेघा ओढीत आहेत. इ. स. ७०० शतकापर्यंत जैनधर्म आणि जैन संस्कृतीचा प्रसार आणि विजय दक्षिणेंत निरंकुशपणानें होत होता. दक्षिणेंतील (महाराष्ट्रांतील) सामान्य जनता ह्या संस्कृतीची होती; इतकेंच नव्हे तर कदंब, यादव, शिंदे, राष्ट्रकूट, चालुक्य, कलच्छुरी इत्यादि प्रसिद्ध क्षत्रिय राजवटींनीं जैन, बौद्ध अथवा लिंगायत धर्म उघडपणें अथवा प्रच्छन्न सहानुभूतीनें स्वीकारलेला होता. सुमारें इ. स. ७७० पर्यंत श्री. चिं. वि. वैद्यांनीं आपल्या मध्ययुगीन भारतांत वर्णिल्याप्रमाणें दक्षिणेंत अथवा समग्र भारतांत जातिभेदाचीं बंधनें हल्लींप्रमाणें निगडित झालीं नव्हतीं. इतकेंच नव्हे तर व्यक्ति अथवा समूह जैन, बौद्ध, लिंगायत अथवा वैष्णव धर्मांचा अथवा संप्रदायांचा स्वीकार करीत किंवा अदलाबदलीहि करीत. मात्र एवढेंच कीं, राजवाडे म्हणतात त्याप्रमाणें हें धर्मांतर केवळ पोट जाळण्यासाठीं नसून अत्यंत भक्तिनें व श्रद्धेनें होत असें. कदाचित् राजवटींत असें धर्मांतर झाल्यास तें राजकीय धोरण म्हणून होत असे. पण तेथेंहि केवळ रा. राजवाडे बरळतात त्या न्यायानें पोटाची खळगी भरण्यासाठीं होत नसे. फार तर काय, उत्तरीय ब्राह्मण कुमारिल भट्ट आणि दाक्षिणात्य ब्राह्मण आद्य शंकराचार्य ह्या दोघांनीं ज्या जैन बौद्ध धर्मांची गळेचेपी केली, ते दोन्ही धर्म केवळ राजवाडे हिणवतात त्याप्रमाणें साळूमाळू नव्हते. प्रत्यक्ष कुमारिल (सुमारें इ. स. ७००) ह्यानें प्रथम बौद्धांचें शिष्यत्व पत्करिलें होतें. नंतर त्यानें कृतघ्नपणें त्यांच्यावरच उलटून त्यांचा नाश केला. आद्य शंकराचार्यानें तर बौद्धांचा विज्ञानवाद, अहिंसावाद, विभूतिवाद, मूर्तीपूजा, पुनर्जन्म ऊर्फ अवतारवाद आणि संन्यास संप्रदाय हीं सारीं तत्वें आपलींशी करून, जुन्या वैदिक धर्माच्या यज्ञयागांचा व कर्मठपणाचा पसारा गुंडाळून ठेवून, हल्लींच्या धेडगुजरी, कमअस्सल, बेवारसी, बेपत्ता हिंदुधर्माची मूळ मेढ रोंवली आणि बौद्ध-जैन धर्माला हतवीर्य केल्याचें कुमारिल भट्टाचें श्रेय अथवा अपश्रेय इ. स. ७०० नंतर आपण बळकावलें. ह्यावरून जैनबौद्ध आचार्य हे सोंगाडे संन्याशी आणि साळूमाळू किंवा कुमारिल आणि शंकराचार्य हेच कृतघ्न व घरगिळू हें वाचकांनींच ठरवावें. अशा शंकराचार्यांना धर्माचार्य म्हणण्यापेक्षां धर्ममुत्सद्दी म्हणणें अधिक शोभेल. आद्य शंकराचार्यानें तर बौद्धतत्त्वांवर इतका ताव मारिला आहे कीं, त्याचे काळीं त्यास वैदिकमताचे लोक ‘प्रच्छन्न बौद्ध’ असा टोमणा मारीत. कां तर त्यानें द्राविडांची पूजा, शाक्तपंथ, देवीपूजा आणि लिंगपूजा ह्यांच्याच परंपरागत बळावर आणि विशेषतः बौद्धांचा विज्ञानवाद ऊर्फ मायावादाच्या आयत्या आधारावर आपला “शांकरदिग्विजय” गाजविला ! असें असतां राजवाडे ह्या ब्राह्मण प्रचारकांना परिव्राजकाचार्य समजतात आणि जैनांच्या व बौद्धांच्या अथवा लिंगायतांच्या आचार्यांची सोंगाडे संन्याशी म्हणून निंदा करितात हिला काय म्हणावें ? अशा निंदेला चित्पावनी चोराची उलटी बोंब ह्याहून अधिक अन्वर्थक नांव कोणी वाचकानें शोधून काढिल्यास ते आम्ही आभारपूर्वक इतिहाससंशोधकास बहाल करूं !
कसेंही असो. जैन धर्मावर जो जुलुमाचा आरोप राजवाड्यांनीं केला आहे तो मात्र उलट्या काळजाचा आहे. सुमारें इ. स. ७०० पर्यंत दक्षिणेंत सामान्य जनसमुदायांतच नव्हे, तर प्रसिद्ध राजवटींतूनहि जैन, बौद्ध आणि द्राविडी शैव धर्मांचीच बलवत्तर प्रतिष्ठा होती. वैदीक यज्ञयागांची कांहीं चालुक्य राजांनीं अधून मधून उचल केली. पण संस्कृतीशी समेट करूं पाहणा-या हल्लींच्या वैष्णवसंप्रदायानें आर्य संस्कृतीच्या जीर्णोद्धारार्थ चालुक्यांनीं केलेल्या ह्या तुरळक प्रयत्नांनाहि दाबून टाकून शेवटीं आर्यसंस्कृति नामशेष केली, व हल्लींच्या द्राविडी संस्कृतीची ध्वजा कायमची उभारली. हल्लींची सारी हिंदु संस्कृति आणि हिंदु धर्म वेदबाह्य आहेत. इ. स. ७०० पर्यंत ही संस्कृति जैनांच्या अथवा द्राविड शैवांच्या नांवावर विकत होती. दक्षिणेंतील पुष्कळसा मोठा ब्राह्मण समुदाय जरी संस्कृतीनें पूर्वींपासूनच पूर्ण द्राविड होता अथवा ह्या काळीं झाला होता, तरी त्याला आर्यांच्या संस्कृतीला अशा प्रकारें मूठमाती मिळाली, हें पाहून वाईट वाटत होतें. म्हणून वस्तुतः नाहीं, तरी नांवानें तरी निदान ही दाक्षिणात्य संस्कृति आर्यांच्या नांवानें विकावी, असा त्यांचा फार दिवसांचा प्रयत्न होता. इ. स. ७५० च्या सुमारास अशा खवळलेल्या ब्राह्मणांनीं तत्कालीन राज्यांच्या साह्यानें पुनः एकवार आणीबाणीचा आणि शेवटचा प्रयत्न केला व तो मात्र पूर्ण यशस्वी ठरून बौद्ध धर्मांस तर तिलांजळीच मिळाली व जैन धर्मास भयंकर धक्का बसून, तो आतां कसाबसा जीव धरून आहे. जैन-बौद्धांच्या उलट ह्या प्राणघातकी चळवळीचा पुढाकार तिरुज्ञानसंबंदर आणि तिरुनावुक्करसर उर्फ अप्पार ह्या दोन समकालीन शैव ब्राह्मणांनीं घेतला. पहिल्यानें मदुरेच्या कूण नांवाच्या पांड्य राजाला आणि दुस-याने कांची येथील महेंद्रवर्मा नांवाच्या पल्लव राजाला जैन धर्मांतून शैव धर्मांत घेतलें. तेव्हांपासून जैनांवर कल्पनातीत भयंकर कहर गुदरला. आठ हजार जैन आचार्यांना व पुढा-यांना सुळावर चढवून देहान्त शिक्षा देण्यांत आल्या. (रामस्वामी आयंगारचा वरील ग्रंथ, पान ६६।६७ पाहा.) अशा देहान्त शिक्षेचीं चित्रें अद्यापि मदुरा येथील प्रसिद्ध मीनाक्षीच्या देवळांतील भिंतींवर मोठ्या दिमाखानें कोरलेली स्पष्ट आढळतात.
राजवाड्यांनीं हें देऊळ पाहिलें आहे. त्यांच्या नाहीं, तरी जैनांच्या डोळ्यांना हीं भेसूर चित्रें दिसण्यासारखीं आहेत. पण लक्षांत घेतो कोण ? प्रोफेसर आयंगार हे ब्राह्मण असूनहि वरील तिरुज्ञानसंबंदर आणि अप्पार ह्या दोन ब्राह्मणांच्या कसाईपणाबद्दल आपला निर्भीड शेरा पान ७० वर इंग्रजींत स्पष्ट शब्दांत दिला आहे. त्यांचें शब्दशः भाषांतर असें आहे : “जैनांसंबंधीं सामान्य लोकांत गैरसमज पसरविणें आणि त्यांच्या आचारासंबंधीं काळ्याकुट्ट रंगांत प्रतिकूल वर्णनें वठविणें हा संबंदरचा मुख्य हेतु होता. शिवीगाळ म्हणजे युक्तिवाद नव्हे. ज्याअर्थीं संबंदर आणि अप्पार ह्यांच्या काव्यांत जैनांविरुद्ध अंगावर शहारे उठविणा-या शिव्याशापांच्या वर्षावाशिवाय दुसरे कांहींच नाहीं, त्याअर्थी त्यांनीं स्वीकारलेली जैनांवर जय मिळविण्याची पद्धत केवळ अडाणीच नव्हे, तर क्रूरपणाची होती, असा निर्णय करणें आम्हांला भाग आहे.” ब्राह्मणांविरुद्ध ब्राह्मणानेंच दिलेला हा निर्णय वाचणा-या वाचकांनींच ठरवावें, कीं “जैन सोडून साप मारावा, कीं ब्राह्मण मारावा !” झाली ती गोष्ट झाली. पण राजवाड्यांसारख्या संशोधकांनीं ती आपल्या अनुयायांना उलट कां भासवावी ? सापहि असे कृत्य करीत नाहीं, तें महाराष्ट्रीय संशोधक अलीकडे कां करूं लागले आहेत ? हें कोडें कोणी उकलील काय?
रा. राजवाड्यांनीं अखिल महाराष्ट्राची कशी नाचक्की केली आहे, हें वर दाखविलें. ब्राह्मणाला तेवढें पूज्य मानून बाकी उरलेल्या क्षत्रिय वैश्यांसंबंधी त्यांनीं आपला अनादर उघडपणें व्यक्त केला आहे. शूद्र म्हणजे तर कुत्र्या-मांजराहून कमी, अशी त्यांची भावना दिसते. आर्य स्त्रियांविषयीं देखील त्यांची दाक्षिण्यबुद्धी नाहीं, तर मग शूद्रांविषयीं कोठून असणार ? त्यांतल्या त्यांत शूद्र स्त्रियांविषयीं त्यांनीं जी बेशरमपणाची नालस्ती केली आहे, ती वाचून तर राजवाड्यांना आई होती कीं नाहीं, ह्याचाहि संशय येऊं लागतो. आर्यवंश आणि ब्राह्मण वर्ण ह्यांच्या धुंदीमुळें स्त्रीदाक्षिण्य ही चीज त्यांच्या मनःकोषांतून अजीबत नष्ट झालेली दिसते. पितृसावर्ण्य आणि मातृसावर्ण्य अशा गंभीर विषयांची मीमांसा त्यांना ह्याहून अधिक भारदस्त वृत्तीनें, निदान शब्दांनीं तरी खास करतां आली असती. असो हा लेखांक फार लांबला म्हणून बाकीचा विषय पुढील अंकी समाप्त करूं.

जैन आणि बौद्ध भागवत

तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें सर्व भागवत संप्रदायांचा पाया सांख्य आणि योग ह्या सर्वांत प्राचीन दर्शनांवरून झालेला दिसतो. पूर्व मीमांसेच्या कर्मठपणाशीं कोणत्याहि भागवत संप्रदायाचें जुळणें शक्य नाहीं. उत्तर मीमांसेंतील शुद्धद्वैत भागाशीं कांहीं भागवताचे फारतर अंशत: जुळण्याचा संभव आहे. जैनबुद्धांपैकीं जैन मत पूर्वींचें. दोन्ही निरीश्वरवादी आणि वेदाशीं तुटून असलेलीं परंतु सांख्य - योगाशीं दोन्हीचें पूर्ण सख्य. त्यांतल्या त्यांत सांख्यांची आणि जैनांची फारच गट्टी. सांख्य-दर्शनहि निरीश्वर व वेदाला न मानणारें म्हटलें तरी चालेल. सांख्य दर्शन प्रकृति आणि पुरुष (अनेक जीव ह्या अर्थीं) दोनच तत्त्वें शाश्वत स्वरूपाचीं मानितें, तद्वत् जैन दर्शनहि जड आणि अजड (जीव) हीं दोनच शाश्वत तत्त्वें मानतें. ईश्वर हें तिसरें तत्त्व जैन, बौद्ध, अथवा सांख्य दर्शन मानीत नाहींत. पतंजलीच्या काळीं योगांमध्यें ईश्वर प्रथम केवळ चित्ताची एकाग्रता होऊन लय लागावा, येवढ्याच सबबीवर आला. पुढें कायमचेंच ठाणें धरून बसला. पतंजलि हा स्वत: ईश्वरवादी शिवभागवत होता. त्यानें योग दर्शनांत ईश्वर कल्पनेचा शिरकाव जोरानें केला, याचें कारण श्वेताश्वेतरोपनिषदच असावें. जैनांनीं मात्र ईश्वरतत्त्वाचा आपल्या ज्ञानांत शिरकाव होऊं दिला नाहीं. पण त्यांच्या उपासनेंत तीर्थंकारांनीं ईश्वराची जागा घेतली आहे. बुद्ध मुनि ईश्वरालाच नव्हे तर आत्म्याला किंबहुना ब्रह्म ह्या कैवल्य वस्तूलाहि मानण्याची आवश्यकता निर्वाणाला नाहीं, असें सांगत असे. पण त्याचा अतुल स्वार्थत्याग, करुणा, मैत्रिभावना, संघटनाशक्ति व चातुर्य इत्यादि गुणांचा त्यांच्या निकटवर्ती अनुयायांवर इतका मोहून टाकणारा परिणाम झाला असावा कीं, तो बुद्ध हा केवळ लोकोत्तर पुरुषच नव्हे तर मनुष्य कोटीवरील पायरी साक्षात् ब्रह्माचेंच एक स्वरूप होता, इ. वाद त्याचे तरुण भक्त उपस्थित करूं लागले. बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेच भरलेल्या वैशाली येथील परिषदेंतच त्यांच्या अनुयायांचे स्थविरवादी आणि महासंघिक असे दोन तट पडले. पहिला पक्ष जो वृद्धांचा तो बुद्धाला एक लोकोत्तर महापुरुष येवढेंच समजून राहिला; पण दुसरा तरुणांचा पक्ष बुद्धाला देव किंबहुना शाश्वत ब्रह्माचेंच रूप मानूं लागला. असें होतां होतां, ३-४ शतकांनीं अश्वघोष आणि नागार्जुन ह्या आचार्यानीं तर महायान पंथ नांवाच्या बौद्धांचा एक स्वतंत्र पंथ स्थापला. ह्या नवीन पंथाचे बुद्ध म्हणजे साक्षात् सगुणब्रह्म असें मत आहे. तोच पंथ पुढें सर्व आशियाभर पसरला. मूळच्या बौद्धाचा ऊर्फ स्थविरवाद्यांचा पक्ष अल्पसंख्याक स्थितींत आपल्या स्वत:च्या निर्वाणापुरताच विचार करणारा असा होता, आणि तो प्रत्यक्ष बुद्धाच्या शिकवणीचा ज्या पाली ग्रंथांत समावेश आहे, अशांची पूर्वींच्या शुद्ध अनात्मवादी स्थितींत राखण करणारा असा सिंहलद्वीप आणि ब्रह्मदेशांतच काय तो हीनयान या नांवानें आहे. इतरत्र तिबेट, नेपाळ, चीन, जपान वगैरेकडे महायान पक्षाचाच विस्तार झाला आहे. ह्या महायानाचे मूळ ग्रंथ संस्कृत भाषेंत असून त्यांचीं भाषांतरें चीन, तिबेट, जपानी, सयामी भाषेंत ख्रिस्ती शकाच्या आरंभींच्या शतकांतच होऊन चुकलीं आहेत. हीनयानाचे सर्व ग्रंथ प्रथम सिंहली भाषेंत लिहिले होते, ते सुमारें ५ व्या शतकांत पाली भाषेंत लिहिले गेले. ते हल्लीं उपलब्ध आहेत.

जैन धर्माच्या मतांत अगर उपासनेंत बौद्धांप्रमाणें विकास झाला नाहीं. त्याचा हिंदुस्थानाबाहेर फैलावहि झाला नाहीं. तरी पण हिंदुस्थानाच्या पश्चिम आणि दक्षिण भागांत ह्या धर्मानें संस्कृत आणि प्राकृत (देशी) वाङ्मय, साहित्य, ललितकला, राजकारण, लौकिक सुधारणा इ. अनेक बाबतींत विशेषकरून कर्नाटकांत आणि द्राविड देशांत अप्रतिम कामगिरी बजाविली आहे. ह्या धर्माला पाश्चात्त्य पंडित जुन्या मताचा, स्थितिस्थापक, अल्पसंतोषी, निवृत्तिपर, वाढ खुंटलेला अशीं कित्येक नांवें आपापल्या दृष्टिभेदानुसार देत आले आहेत; पण हा धर्म ह्या गुणांमुळेंच हिंदूंच्या उत्तरोत्तर वाढत जाणा-या तिरस्काराला आणि घोर छळाला तोंड देऊन अद्यापि अल्प प्रमाणांत का असेना, पण जीव धरून राहिला आहे, हेंच विशेष अभिनंदनीय आहे. उलट बुद्ध धर्म स्पष्टवादी, उदार, प्रगमशील, जगदुद्धाराच्या आणि प्रचाराच्या बाबतींत अत्यंत धाडशी आणि महत्त्वाकांक्षी असूनहि, शिवाय अत्यंत सहनशील, अहिंसावादी आणि अनत्याचारी असल्यामुळें तो अखेरीस हिंदुस्थानांतील उत्तरेकडील मुसलमानांच्या पशुतुल्य आणि क्रूर अत्याचारांखालीं दडपून गेला आणि दक्षिणेंतील हिंदु राजांच्या बळावर उन्मत्त झालेल्या नूतन हिंदुधर्माच्या आचार्यांच्या महत्त्वाकांक्षी विजिगिषुतेपुढें सपशेल हार खाऊन बिचारा शेवटीं आपल्या जन्मभूमींत केवळ नामशेष होऊन गेला !

जैन धर्म अल्पसंख्याक उरला आणि बौद्ध धर्म केवळ नामशेष झाला, हा जो हृदयद्रावक परिणाम घडून आला, तो कांहीं एक दोन शतकांतच घडला, अशांतला प्रकार नाहीं. हे दोन्ही धर्म भरपूर दीड हजार वर्षें आपलें सत्कार्य करून, विशेषत: बौद्ध धर्म आपले शुभाशुभ परिणाम आद्यापि पूर्ण रूपानें मागें ठेवून बाहेर गेला आहे. परंतु वैदिक धर्माचा मात्र आतां मागमूसहि उरला नाहीं. इतकेंच नव्हे तर हल्लींच्या शैव आणि वैष्णव धर्मांतहि आमूलाग्र उत्क्रांति होऊन त्यांची वैदिक धर्माशीं फारखत झाली; आणि भारत देश आतां अगदींच एकेश्वरी हिंदु धर्माचें ऊर्फ भागवत धर्माचें आचरण करीत आहे. परंतु ह्या सुधारणेचें बहुतेक श्रेय बौद्धांनीं व जैनांनीं जी धर्मसुधारणेची भली खंबीर पाचार मारली, हिंदुस्थानांतील धर्माचा इतिहास दुभंगून टाकला आणि आपल्या दीड हजार वर्षांच्या विरक्त, प्रेमी आणि परोपकारी प्रयत्नानें, नूतन आणि विशुद्ध भागवत धर्माची वाट खुली केली, ह्या गोष्टीकडेच आहे. असें असूनहि ही ऐतिहासिक उत्क्रान्ति आम्हां हिंदूंच्या डोळ्यांत भरावी तशी भरत नाहीं. त्याचें कारण आम्ही बौद्धांना व जैनांना अद्यापि परके, पाखांडी, नास्तिक म्हणून त्याज्य समजतों हेंच. आणि ते त्याज्य कां तर
प्रामाण्य बुद्धिवेदेषु साधनानामनेकता |
उपास्यानामनियम एष धर्म: सनातन: ||

ही आमच्या हिंदु धर्माची टिळकासारख्यांनीं केलेली धेड गुजरी व्याख्या ! प्रचलित हिंदु धर्माची टिळकांनीं जी व्याख्या केली ती कांहीं खोटी नाहीं. पण ती दुष्ट आहे, इतकेंच नव्हे तर ती विष्णुपुराणाहूनहि प्राचीन काळापासून उजळ माथ्यानें वहिवाटत आहे हें खालीं मान घालून कबूल करावें लागतें ! म्हणून बिचारे बौद्ध व जैन त्याज्य झाले.

जागतिक मंदी

दोन प्रकारच्या वरील कठीण परिस्थितींत गेल्या १।२ दोन वर्षांत अखिल जगालाच एक भयंकर क्षयरोग लागल्याचें अचानक उघडकीला आलें आहे. तो म्हणजे, आजकालचे शेतांत निपजणा-या मालाचे झपाट्यानें खालीं घसरणारे बजारभाव. पण ही मंदी व्यापा-यांना, राज्यकारभा-यांना, पगारी नोकरांना, किंबहुना मजुरांना जितकी भोंवते, त्याहून अनेकपटीनें जास्त ह्या असहाय्य व असंघटित शेतक-यालाच भोंवते. ह्याचें एकच कारण हें कीं वरील सर्व वर्गांच्या हातीं नाणीं खेळत असतात. आणि नाण्यांचा मक्ता राज्यकारभा-यांनीं आपल्याच हातीं ठेवलेला असतो. शेतांत सर्व कांहीं पिकलें तरी नाणीं आणि नोटा जोंवर पिकत नाहींत, तोंवर शेतक-यांचे हाल असेच चालणार ! नाणीं पाडण्याचा मक्ता किंवा सोन्याचें परिमाण इतर धातूंशीं ठरविण्याचा मक्ता आमच्या संस्थानिकांना नसल्यामुळें त्यांनीं ही अडचण जाणून शेतसारा धान्याच्या रूपानें घेण्याची योजना आंखणें जरूर आहे. ह्या बाबतींत कायमची तरमबंदीची योजना आड येणार हें आम्ही जाणून आहों. पण शेतक-याकडून सा-याचा आकार नाण्याच्या कृत्रिम रूपानें घ्यावा किंवा धान्याच्या स्वाभाविक रूपानें घ्यावा, हें ठरविण्याच्या बाबतींत कोणताहि संस्थानिक, किंबहुना लावणीनें शेत देणारा खातेंदारहि साम्राज्य सरकारशीं कोणत्याहि तहाच्या अटीनें बांधला नाहीं, ह्याची जाणीवहि शेतक-यावर पोसले जाणा-या ह्या संस्थानिकांनीं व त्यांच्या राज्यांत नांदणा-या खातेदारांनीं ठेवावयास नको काय ? पण आजकालच्या नाण्याच्या धांदलींत ही जाणीव राखणें शेतक-याशिवाय इतर कोणासच फायद्याचें नाहीं. आणि स्वतः शेतक-यांस हें अर्थशास्त्राचें कोडें समजावयास अजून किती नवे जन्म घ्यावयाला पाहिजेत, तें हरीच जाणे ! तरमबंदी एकदां ठरली कीं ती पुढेंच धांवणार. आगगाडीचें एंजिनहि मागें धांवतें. पण तरमबंदी कधीं कोठें मागें हटली आहे काय ? प्रत्यक्ष शेतक-यांचेंच सरकार होईपर्यंत तें शक्यच नाहीं. नुसती आणेवारी मागें न हटविणारीं अधाशी व मतलबी सरकारें, तरमबंदी कसची मागें हटवतील ? जावें त्यांच्या वंशा, तेव्हांच कळे. बजेटाचीं तोंडें मिळवण्याचा वगैरे अनेक प्रश्न राज्यकर्त्यांपुढें जसे आहेत तसेंच शेतक-यांच्या घरींहि आहेत; पण अर्थशास्त्राचा नेमका फायदा मात्र श्रीमंतांना, सत्ताधा-यांना, व त्यांच्या पुढें पुढें करणा-या पोशाखी सुशिक्षितांना, आणि तोट्याचा वारसदार मात्र एकटा अडाणी शेतकरीच ! ह्या शेतक-यांचा अडाणीपणा कमी करून त्यांनीं नवीन आशा व नवीन जोम धरून आपला सर्व जगाला पोसणारा हा पवित्र शेतीचा धंदा करावा, म्हणून कांहीं स्वार्थत्यागी, बिनपोशाखाचे सुशिक्षित व करारी माणसें पुढें आलीं, कीं कोणतेंहि सरकारच नव्हें तर खातेदार, जमीनदार अथवा सावकार ह्यांचेंहि धाबें दणाणतें. चळवळ राजकारणापासून कितीहि दुर ठेविली व नुसत्या अर्थशास्त्राची गुंतागुंती जगाला कशी भोवतें हेंहि प्रांजळपणें सांगणा-यांना, ते उपद्व्यापी राजद्रोही आहेत अशी हूल राज्यकर्त्यांकडूनच नव्हे तर त्यांचे साथीदार सुखासीन भांडवलदार व नोकरशाही ह्यांच्याकडूनहि उठविण्यांत येतें. ख-या आपत्तींत मतलबी अडचणींची भर पडून दिशाधुंद होतात. एकपुती रडतो त्याहून सातपट जोरानें सातपुतीहि रडूं लागतो. मग ह्या गोंधळांत बिचारा निपुत्रिक व बेवारशी शेतकरी अगदीं गांगरून जातो. त्याला शत्रू, मित्र कांहींच कळेनासें होतें. अशा बेफाम परिस्थितींत जर अडाणी शेतकरी कोंडलेल्या मांजराप्रमाणें कोंडणा-यांचाच कंठ फोडण्यास धांवूं लागला, तर त्याची जबाबदारी कोणावर बरें. तसें होऊं नये म्हणूनच ही परिषद आहे.

जमीनदार वर्ग

वाळवें तालुका परिषदेंत मीं शेतक-याची स्पष्ट व्याख्या केली, ती अशी कीं, जो आपल्याला, व आपल्या आश्रितांना आवरेल इतकीच जमीन धारण करतो व ती वाहतो म्हणजे तिची स्वतः मशागत करून भरपूर उत्पन्न काढतो तोच शेतकरी, इतर कोणीहि नव्हे ! जमिनीची सात्त्विक मालकी सर्व राष्ट्राचीच असते. पण दुर्दैवानें राष्ट्राचा ताबा परकी सत्तेकडे गेल्यास ह्या तत्त्वास बाध येतो. अशा अपवादाचे वेळीं जमिनीची पूर्ण मालकी ती वाहणा-या कुणब्याकडेच येते. ही हिरावून घेण्यासाठीं कोणीं कितीहि चतुराईनें कायदे केले तरी त्यांना न्यायाच्या दृष्टीनें शेतांतील एका काडीचीहि किंमत राहात नाहीं. अशी परकीय सत्ता देशांत आल्याबरोबर ती प्रथम आपल्या पोषणासाठीं कुणबी व आपण ह्यांच्या दरम्यान जमीनदार नांवाचा एक मध्यस्थ वर्ग निर्माण करते. ‘ना मला आणि ना तुला तर द्याल कुत्र्याला’ ह्या न्यायानें अशा आपत्तीच्या काळीं जमिनीची मालकी ह्या वर्गाच्या दाढेंत जाते. मग तो वर्ग इतका डोईजड होतो कीं ही सत्तादेखील कमीअधिक मानानें त्यांच्या आहारीं जाते, मग कुणब्याचे हाल काय विचारतां ?

चौदावें शतक

(३) इ. स. १४ व्या शतकाचा प्रारंभ हा ज्ञानेश्वरीचा उदय होऊन मराठीचा भाषा ह्या नात्यानें कानडीपासून स्वतंत्र होण्यानेंच महत्त्वाचा नाहीं, तर राजकीय इतिहासाच्या दृष्टीनें दक्षिणेंत जी मोठी राज्यक्रांति झाली तिच्यामुळेंहि महत्त्वाचा आहे. चालुक्यांचे मांडलिक देवगिरीचे यादव हे मराठी बोलणारे होते. आणि त्यांचेंच दुसरें महामंडलेश्वर म्हैसूरचें होयसळ घराणें कानडी बोलणारें होतें. हे दोघेहि चालुक्याच्या उलट बंड करून स्वतंत्र झाल्यावर लवकरच मुसलमानांची टोळधाड येऊन हिंदुपदपादशाहीला कायमचाच धक्का बसल्यामुळें यादवांचा आणि होयसळांचा नायनाट झाला आणि जरी लवकरच त्या भयंकर यज्ञकुंडांतून ओरंगळच्या राजवटीचें रूपांतर होऊन विजयनगरचें नवीन राज्य उदयास आलें तरी कर्नाटकाची उत्तर सीमा जी आतांपर्यंत गोदावरीचें दक्षिण-तीर होती ती ह्यानंतर कृष्णेचें दक्षिण-तीर होऊन प्रत्यक्ष राजधानी तर तुंगभद्रेच्याहि दक्षिण-तीरावर प्रतिष्ठित झाली. इ. स. १५६५ तील तालीकोटच्या लढाईंत ह्या शेवटच्या हिंदुपादशाही वरून मुसलमानांचा वरवंटा सफाईनें फिरला आणि कर्नाटकाच्या राजवैभवाची जी अगदीं मिणमिणीत मेणबत्ती कावेरीच्या तटावर जीव धरून होती ती देखील हैदर अल्लीनें इ. स. १८ व्या शतकांत फुंकून पार नाहिंशी केली.
(४) अशा रीतीनें राजकारणाच्या दृष्टीनें कर्नाटकाचा बुडता पाय जो उत्तरोत्तर खोलांत जाऊं लागला तो अद्यापि यावा तसा वर येत असलेला दिसत नाहीं. मुसलमानांच्या वरवंट्याखालीं, विशेषतः तालीकोटच्या निःपातानंतर, कानडी बोलणारे मराठे जे रेड्डी, राजू, होयसळ, पल्लव ऊर्फ पालवे, कदंब इ. ते कायमचे दबून गेले. पण देवगिरीचे जाधव, फलटणचे निंबाळकर, बदामीचे शिंदे आणि माने, वाडीचे सावंत, कोंकणपट्टींतले आंग्रे, मोरे, शिर्के इ. अनेक घराणीं जरी प्रत्यक्ष राजपदावरून चमकत नव्हतीं, तरी त्यांचीं वरून कोळशाप्रमाणें दिसणारीं द्रव्यें इतकीं सहज ज्वालाग्राही होतीं कीं, शहासूनु शिवरायानें फुंकर मारल्याबरोबर तीं मराठी स्वराज्याचीं होमकुंडें बनलीं. सतराव्या शतकांत नवीन महाराष्ट्र महोदधि जो उचंबळला तो उत्तरेस नर्मदेपासून तों दक्षिणेंत तुंगभद्रेपर्यंत पसरला; इतकेंच नव्हे तर तिच्याहि पलिकडे कावेरीच्या कांठीं तंजावरावर ह्याची ध्वजा लागली. एकंदरींत ह्या द्विगुणित राज्यक्रांतीमुळें, अगोदरच चौदाव्या शतकांत स्वतंत्र झालेली जी मराठी भाषा, तिला जरी शिवपूर्वकालीं मुसलमानी राजकारणाचा आणि फार्सी भाषेचा सासुरवास सोसावा लागला तरी शिवोत्तरकालीं तिला राजकारणाची अपूर्व जोड मिळाल्यामुळें ती एखाद्या महापुरानें बेफाम झालेल्या नदीप्रमाणें गोदावरीचा किनारा हा आपला मुख्य प्रदेश ओलांडून स्वस्थ न बसतां कृष्णेच्या पलीकडील व तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कानडीचाहि प्रांत जी एकदा बळकावून बसली आहे, ती तो अद्यापि परत करण्याचीं कांहींच चिन्हें दिसत नाहींत. ज्या प्रदेशाला खरोखरी उत्तर-कर्नाटक म्हणावयाला पाहिजे त्याला आम्ही आतां दक्षिण-महाराष्ट्र म्हणत आहों.

  1. चैतन्यचरित्र
  2. चैतन्य पंथाची भूमिका
  3. चालू स्थिति
  4. चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी
  • 72
  • 73
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
Page 77 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी