1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

अस्पृश्यांचें राजकारण

प्रस्तावना
सद्यस्थितींत या विषयावर मीं माझे विचार प्रकट करणें जरूर आहे असें समजून माझ्या कांहीं मित्रांनी व सहका-यांनी आग्रह धरला. इतक्यांत वसंत व्याख्यान मालेकडूनहि व्याख्यानाविषयीं विनंती करण्यांत आली, म्हणून मी माझे विचार व अनुभव सांगण्यास आज तयार झालों आहे. आजच्या व्याख्यानांत कोणत्याहि प्रकारचे सिद्धान्त ठरवावयाचे नाहींत अगर गाजवावयाचे नाहीत, म्हणून आज कोणी अध्यक्ष नको अशी मालाकारांजवळ विनंती केली, कारण माझें भाषण केवळ प्रवचन आहे. त्याला निर्णयाची जरुरी नाहीं, पण वहिवाटीच्या सबबीवर मालाकारांनीं माझी विनंती मान्य केली नाहीं. टीकाकारांनीं माझ्या भाषणावर वाटेल तशी टीका करावी, पण अध्यक्षांनीं निर्णय देण्याची तसदी घेऊं नये अशी माझी विनंती आहे. राजकारणांत कांहीं पक्षोपपक्ष असतात पण मी आतांपर्यंत राजकारणाच्या कोणत्याहि पक्षांत सामील झालेलों नाहीं. अस्पृश्यांतहि आज असे पक्ष जोरानें दंड थोपटून उभे आहेत. त्यांच्यांतहि मध्यस्थी करून राजकारणाचें जागतिक असें जें उच्च कार्य असतें तें करण्यास मी केव्हांही तयार आहें. श्रोत्यांनींहि अशाच निर्विकार व उदात्त भावनेनें माझे चार अल्पबोल ऐकावेत. खवळलेल्या सद्यस्थितींत पक्षाच्या लाटांवर वाहून जाण्याचा प्रयत्न मीहि करीन, आपणही सर्व कराल आशी आशा आहे.

अस्पृश्यांच्या राजकारणावर बोलण्यापूर्वीं राजकारणाचा अर्थ पाहूं. त्यामुळें प्रवचनाच्या अर्ध्याअधिक भागाचा खुलासा सहज होऊन या क्लिष्ट प्रश्नाचा मार्ग सोपा होईल. राजकारणाचा अर्थ अर्थकारक (Economics) म्हणजे अर्थाच्या आधारें समाजशास्त्राची धारणा एवढाच आहे. समाजाची धारणा व्हावी म्हणून अर्थशास्त्रासारखें शासनशास्त्राचेंहि तत्त्व राजकारणांत समाविष्ट होतें, पण हें दुसरें तत्त्व शक्य तोंवर गौण असावयास पाहिजे. प्राचीन काळीं जेव्हां जीवनकलह इतका तीव्र नव्हता तेव्हां राजकारणांत अर्थशास्त्राचेंच प्राधान्य होतें. पण पुढें जसजसें कनक आणि कांता या लोभनीय वस्तूंविषयीं मारामारी सुरू झाली तशी राजकारणांत अर्थशास्त्रापेक्षां शासनशास्त्राचें प्राबल्य वाढलें. पण अलिकडे इतर भावनामय अवांतर गोष्टींपेक्षां पोटापाण्याच्याच प्रश्नाला प्राधान्य येऊं लागल्यामुळें आजकालच्या राजकारणांत अर्थशास्त्रालाच पूर्ववत् प्राबल्य येऊं लागलें आहे. कनक हें मुख्य साध्य आणि त्यासाठीं शासनाची हांव हें केवळ साधन होऊन बसलें आहे.

सर्व राजकारणाची जर ही मीमांसा तर हिंदुस्थानांतील अस्पृश्यांच्या राजकारणाला पोटापाण्याचें महत्त्व यावें यांत काय नवल आहे ? ‘अस्पृश्य’ हे अल्पसंख्याक हतवीर्य हतबल पददलित आहेत. त्यांना दुस-यावर शासन चालवण्याची हांव अद्यापि तरी नाहीं. कशी असणार ? मात्र दुस-यांची त्यांच्यावर मिरवण्याची हांव अद्यापि तिळमात्रहि कमी झाली नाहीं; मग ते क्षत्रिय  असोत, ब्राह्मण असोत, शूद्र असोत, स्वकीय असोत, कीं परकीय असोत, प्रागतिक असोत कीं स्थितिनिविष्ठ असोत, जोंपर्यंत हे डोईजड वर्ग का आपल्या इज्जतीखातर अस्पृश्यांच्या योगक्षेमांत आणि स्वयंनिर्णयांत ढवळाढवळ करूं पाहतात तो ‘अस्पृश्य’ आजकाल करूं देण्यास तयार नाहींत. एवढाच त्यांच्या राजकारणाचा अर्थ आतांपर्यंत माझ्या अनुभवास आला आहे. पुढें काय होईल त्याविषयीं भविष्यवाद करण्याचे हें स्थळ नव्हे. अस्पृश्यांची आजची भूक एवढी थोडी असतांना त्यांच्या स्पृश्य शत्रुमित्रांना काय वाटतें तें पाहा. ‘अस्पृश्य’ स्पृश्यांच्या दावांतून सुटल्यावर लवकरच ते सूड उगवण्याच्या मार्गाला लागतील आणि स्पृश्यांवर आज जे जुलूम करणारे परकीय आहेत त्यांच्याशीं एकजीव होतील (जणू परकीय तसे होऊं देतीलच) आणि परकीयांच्या साह्यानें स्पृश्यांवर जुलूम करूं लागतील वगैरे वगैरे अनेक भीतीचे काहूर आम्हां स्पृश्यामध्यें माजलें आहे. ह्या काहुराला नीतीचें आणि न्यायाचें किती पाठबळ आहे हें मला स्पष्ट सांगण्याची इच्छा नाहीं. ही सांगण्याची इच्छा ऐकणा-याच्या तयारीवर अवलंबून राहणार.
अस्पृश्यांचें राजकारण अस्पृश्यतेइतकेंच प्राचीन आहे आणि तें सांगण्यासाठीं अस्पृश्यतेचा उदय कसा झाला हें सांगूं केल्यास प्रवचनाचा व्याप मर्यादेपलीकडे वाढेल. पुढेंमागें हाच विषय निराळ्या ग्रंथद्धारें प्रसिद्ध होत असल्यामुळें अत्यंत संक्षेपानें हा मुद्दा सांगणें जरूर आहे. मानववंशाचे पृथक् भाग प्राचीन कालीं एकमेकांशीं लढत असत. परस्परांच्या संस्कृतीबद्दल अभिनिवेश उत्पन्न होऊन वंशद्धेश मनुष्य जातींत रूढ झाला. याच वंशद्धेषाला जादुटोणा, मंत्र, विटाळचंडाळ, सोवळेंओवळें आणि शेवटीं रूढधर्म यांचेंहि पाठबळ मिळून कांहीं विशिष्ट वंश इतर मानववंशांनीं आपल्यापासून दूर ठेवले. याप्रकारें सामाजिक अस्पृश्यतेचा पाया घालण्यांत आला. एका वंशानें दुस-या वंशास जित केल्यावर जेत्यांनीं जिताला गुलामगिरींत ठेवल्याचीं अनेक उदाहरणें इतिहासांत आहेत. अशा गुलामांना ‘अस्पृश्य’ मानण्याचीं उदाहरणेंहि प्राचीन काळीं पश्चिम आशियांतील सेमेटिक, मध्य आशियांतील हिंदु आणि पूर्व आशियांतील ब्रह्मदेश, जपान इत्यादी राष्ट्रांत आढळते. ‘अस्पृश्य’ मानलेले वंश सारे संस्कृतिहीनच होते असें मुळींच नाहीं. ब्रह्मदेशांत ‘तुव्हायाजा’ (अशुभ राजा), फयाचून वगैरे जे अस्पृश्य वंश आढळत आहेत, ते जिंकले जाण्यापूर्वीं राजवंश होते. हेंच तर काय हल्लींच्या सुधारलेल्या काळींदेखील द. आफ्रिकेसारख्या ठिकाणीं हिंदूसारख्या काळ्या वंशाला तेथील गोरे वसाहतकार अस्पृश्याप्रमाणेंच ग्रामबाह्य ठरवतात. यावरून अस्पृश्यतेला संस्कृति अथवा संस्कृतिचा अभाव हें कारण ठरत नाहीं. जेत्यांनीं जितांशीं चालविलेलें राजकारण हेंच ह्या जातिविशिष्ट अस्पृश्यतेचे हेतू होत हें सिद्ध होतें.

ह्याच वंशद्वेषाला पुढें पुढें रूढ धर्माचें पाठबळ मिळाल्यामुळें ह्या भरतखंडांत पूर्वीं अल्प असलेल्या अस्पृश्यांची संख्या कालवशात् इतकी अवाढव्य झाली आहे. समाज सुसंपन्न आणि सुसंस्कृत स्थितींत असला तर १० वर्षांत त्याची दुप्पट वाढ होते असा एक सामान्य लोकसंख्याशास्त्राचा अजमास आहे. ह्या अजमासाप्रमाणें अस्पृश्यांची संख्या वाढलेली असणें शक्य नाहीं. कारण हे दुर्दैवी मानववंश एकदा अस्पृश्य आणि ग्रामबाह्य ठरल्यावर त्यांच्यांत संपन्नता आणि संस्कृति कोठून उरणार ? असें असूनहि त्यांची संख्या जी इतकी प्रचंड वाढलेली आहे त्याला कांहीं विपरीत कारणेंच असलीं पाहिजेत. तीं कारणें म्हणजे या प्रचंड खंडवजा देशांत धर्माच्या आणि धर्मपंथाच्या नांवावर ज्या क्रांत्या आणि जुलूम झालेले आहेत तेच होत. बौद्ध, शैव, वैष्णव, शाक इत्यादि पंथांच्या मारामा-या दक्षिणेंत द्राविडांमध्यें व उत्तरेंत आर्यांमध्यें झाल्यामुळें पूर्वीं स्पृश्य असलेले जातिसमूह अस्पृश्यांत ढकलण्यांत आले. अशाविषयीं ऐतिहासिक दाखले कर्नल अलकॉटसारखे परकीय धर्मप्रचारक आणि महामहोपाध्याय हरिप्रसादशास्त्री यांच्यासारखे पुराणमतवादी संशोधक यांच्या ग्रंथांत आढळतात.
थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अस्पृश्यता म्हणजे स्पृश्यांच्या दूषित राजकारणाचें एक दृढमूल झालेलें जाळें आहे. अस्पृश्यांमध्यें जो आतां हीनपणा आलेला आहे त्यामुळेंच अस्पृश्यता उदय पावली असें म्हणण्यानें कार्यकारणांचा विपर्यास हल्लींच्या काळींसुद्धां जाणत्या लोकांकडून होत आहे ही एक करमणुकीची गोष्ट. समाजशास्त्राचें निरपेक्ष अवलोकन केल्यावर जातीय अस्पृश्यता ही हीनतेचें कार्य नसून उलट ती दीनतेचें कारण आहे असें दिसून येतें; आणि ब्रह्मदेशांतील अस्पृश्य लोकांचा इतिहास पाहिल्यास हा कार्यकारणभाव सिद्ध होतो. कांहीं असो, अस्पृश्यतेची व अस्पृश्यांसंबंधीं स्पृश्यांच्या राजकारणाची ही मीमांसा साधारण लोकांच्या गळीं सहज उतरेल अशी माझी तरी अपेक्षा नाहीं. तथापि प्रस्तुत विषय माझ्या अपेक्षा नसून अस्पृश्यांसंबंधीं माझें निरीक्षण, अध्ययन, संशोधन, अनुवाद हींच होत.

अस्पृश्यांच्याविषयीं पूर्ण आणि निष्काम सहानुभूति वाटल्यावरून भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी या नांवानें अखिल भारतांतील अस्पृश्यांच्या सेवेसाठीं आणि शुश्रूषेसाठीं एक विधायक धर्मकार्य उघड स्थापण्यांत आलें. पण त्यापूर्वीं बरींच वर्षें त्यांच्या स्थितीचें अध्ययन चाललेंच होतें. हें कार्य निघाल्याबरोबर अनुकूल व प्रतिकूल टीकांचा गहजब उडाला, सहानुभूतीइतकाच विरोधाचा वर्षाव झाला, बाहेरील सहका-यांइतकाच अंतःकलह माजला. या मंडळींच्या विधायक कार्यामुळें मंडळीच्या बाहेरहि विक्षोभक चळवळ प्रचंड माजली. राष्ट्रीय सभेच्या केवळ राजकारणाच्या रणांगणांत अस्पृश्यांच्या नांवावर रणशिंग वाजूं लागले. पक्षात्मक राजकारणांत भाग न घेतां मंडळीनें उच्च आणि मूलभूत राजकारणांत अस्पृश्यांच्याहि वतीनें भाग घेण्यास माघार घेतली नाहीं. मात्र हें सर्व काम मंडळीनें गाजावाजा न करतां केलें. त्यांचा प्रयत्न विधायक असल्यामुळें तो अद्यापि चालूं आहेच. हा प्रयत्न चालूं असतां मंडळीवर प्रतिकूल टीकास्त्रांचा जो वर्षांव झाला त्यांतील कांहीं मासल्यांचा उल्लेख करणें विषयाला धरून आहे. हे उल्लेख मंडळीच्या संरक्षणासाठीं नसून विषयाच्या परिपूर्ततेसाठीं आहेत.

या मंडळीचें हें कार्य अस्पृश्यांच्या उद्धारासाठीं नसून ब्राह्मणादि उच्च वर्गांना खालीं ओढण्यासाठीं आहे, अशीं नुसतीं सुटींसुटीं विधानेंच करून न राहतां या जाड्या जाड्या विद्वानांनीं सुसंबद्ध व्याखानें दिलीं आहेत. तीं मला आज चांगलीं आठवतात. मंडळीच्या कार्याची घटना सर्व देशभर होऊन त्याचा परिणाम जाणवूं लागल्यावर १९२३ सालच्या जानेवारीच्या अंकांत अस्पृश्योद्धार या मथळ्याखालीं रा. रा. महादेव राजाराम बोडस या लेखकानें चित्रमयजगतासारख्या सन्मान्य मासिकांत एक मननीय लेख लिहिलेला आहे. त्यांतील एक महत्त्वाचा मुद्दा व्यक्तिविषयकता बाजूस ठेवून आजच्या विषयासाठीं विचारांत घेणें जरूर आहे.
वरील लेखांत पान ४५ वर खालील उतारा वरील मंडळीच्या कार्यासंबंधानेंच नव्हे तर साधारण हितासंबंधींहि महत्त्वाचा आहे –

“ आपलीं सामाजिक व धार्मिक सुधारणांचीं तट्टें चोहींकडे नाचविण्याकरतांच निराश्रितांचा कैवार घेणा-यांचे हातून त्यांचा उद्धार कधींहि व्हावयाचा नाहीं. कारण त्यांच्या प्रामाणिकपणावर लोकांचा विश्वास बसत नाहीं. कोणतीहि चळवळ एकनिष्ठ असल्याशिवाय यशस्वी होत नाहीं. एका कामांत दुसरीं दहा खेकटीं घुसडलीं कीं, सर्वच कामें बिघडतात. अस्पृश्यतेच्या प्रश्नाला रोटीबेटीव्यवहार आणि सनातन धर्माची टवाळी चिकटविल्यानें निराश्रित शिखंडींना पुढें करून सबगोलंकार करण्याचा या मंडळीचा बेत आहे. अशी साधारण लोकांची समजूत झाली व त्यामुळें कारण नसतां सर्व जातींचा या चळवळीला विरोध होऊं लागला. पण तेच सन १९१८ सालीं लो. टिळकांनीं सहानुभूति दाखविल्याबरोबर १९२० सालीं महात्मा गांधींनीं हा प्रश्न हातीं घेतला व १९२१ सालीं अहमदाबादच्या काँग्रेसमध्यें राजकीय व राष्ट्रीय करून टाकला. विठ्ठलराव शिंद्यांना १२ वर्षांत जें कार्य करतां आलें नसतें तें गांधींनीं दोन दिवसांत केलें, म्हणजे शिंद्यांच्या कामाचें महत्त्व कमी होतें असें नाहीं. उलट असेंहि म्हणतां येईल कीं, शिंद्यांच्या १२ वर्षें नांगरणीमुळें गांधींना बीजारोपण करतां आलें. परंतु एकाच कार्याविषयीं उभयतांचा दृष्टिकोण आणि कार्यपद्धति यांतील भेद दाखविण्याकरतांच ही तुलना केली. रा. शिंदे निराश्रितांना व्यक्तिशः सुखी करण्याकरतां झटत असल्यामुळें समाजाला, विशेष कळकळ वाटत नव्हती. समाजांत सुखी व दुःखी दोन्ही प्रकारचे लोक असल्यामुळें वैयक्तिक सुखाविषयीं लोकांना फारशी आस्था वाटत नाहीं. पण राष्ट्राच्या भवितव्यतेचा प्रश्न आला कीं, सर्व समाज खडबडून जागा होतो. पांचसहा कोटी निराश्रितांचा उद्धार करावयाचा तो त्यांनीं अधिक सुखांत व ऐषआरामांत राहावें म्हणून नव्हे तर तीस कोटी हिंदी राष्ट्र एकजीव होऊन स्वराज्य मिळवण्यास लायक व्हावें म्हणून. लो. टिळकांनीं निराश्रितांविषयीं नुसती शाब्दीक कळकळ दाखविली म्हणून त्यांची टवाळी करणाराच्या एक गोष्ट लक्षांत येत नाहीं कीं, ज्यांच्या हातांत निराश्रितांची चळवळ आहे त्यांची जास्त योग्यताच नाहीं. टिळक-गांधींसारख्यांकडून जास्त मदत मिळवायची असेल तर त्यांच्याप्रमाणेंच राष्ट्रकार्याला कंबर बांधली पाहिजे. साहेब लोकांना खुष ठेवायचें, मिशनरींच्या मागें लागावयाचें, पैशाकरतां श्रीमंत लोकांच्या दारोदार हिंडावयाचें; मग लो. टिळकांनींहि असल्या भिक्षेक-यांना नुसत्या शब्दांची भीक घातली तर नवल काय ? ‘ You cannot serve both God and mamom at the same time’  अशी एक इंग्रजींत म्हण आहे. निराश्रितांना केवळ ऐहिक सुखें देणेंच ज्यांचें ध्येय त्यांनीं सर्व ऐहिक सुखावर पाणी सोडलेल्या टिळक-गांधींसारख्यांकडून मदतीची अपेक्षा करूं नये हेंच उत्तम, कारण त्यांचें ध्येय निराळें, मार्ग निराळा व दृष्टिकोणहि निराळा.”

अस्पृश्यांची शेतकी परिषद

शेतकी प्रदर्शन : चालूं शेतकी प्रदर्शनाबद्दल लोक फार साशंक आहेत. कारण मन चिंती तें वैरी न चिंती. ह्यांत हिंदुस्थानचा किंबहुना शेतक-याचा कांहीं फायदा नाहीं; हें इंग्रजी भांडवलशाहीचें एक डोहाळ जेवण आहे, अशी अफवा आहे. असाच खराच प्रकार असल्यास | अजि हौस जिजीची पुरवा | हर गर्भवतीचा नुरवा ||ध्रु.|| सित छत्र तिच्या शिरीं धरवा | सित चामर सुंदर फिरवा ||  गज शिबिका द्यातुनि मिरवा | नव भव्य महोत्सव करवा || पाचु हार चुडा हिरवा | हिरवा शालु, वेणिंत मरवा || शृंगार थाटुनि बरवा | प्रिय सखिची ओटी भरवा ||१|| ही खरेशास्त्रीकृत आरति प्रदर्शनअखेर म्हणून शेतकी कमिशनची ओटी भरणें अगदीं योग्य आहे. तें कसेंहि असो. चालू डोहाळ जेवणांत “अस्पृश्यां”चा काय संबंध आहे हा एक मोठा प्रश्नच आहे. कानडींत एक म्हण आहे कीं राजाला मुलगा झाला तर, दासीला दहा घागरी पाणी जास्तच. यदाकदाचित् थोडासा फायदा शेतक-यांस झाला तरी, एकंदरींत भारतीय अस्पृश्य वर्ग शेतकरीपदाला अद्यापि पोंचला नाहीं हें मी प्रतिज्ञेवर सांगतों.
इ. स. १९०१ सालच्या खानेसुमारींत म्हटलें आहे कीं हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येचे दोनतृतीयांश शेतकीवर अवलंबून आहेत; वट्ट संख्येचे शेंकडा ५२ जमिनीचे मालक व कुणबी (वाहणारे) मिळून आहेत. पण अस्पृश्यांची गणना ह्या दोन्ही वर्गांत होत नाहीं. शेंकडा १२ शेतकीवरचे मजूर आहेत. आणि अस्पृश्यांची गणना मजुरांतहि होत नसून, ती बिनमुदतीच्या जमिनीवरच्या गुलामांतच करण्यालायक आहे. एका मद्रास इलाख्यांतच सुमारें २ कोटी अस्पृश्य आहेत. त्यांपैकीं निदान एक कोटी तरी ह्या गुलामगिरींत हल्लीं खितपत पडलेले मी माझ्या डोळ्यांनीं वारंवार पाहून येत आहे. केवळ शेतकीवर निर्वाह होतो येवढ्यावरून अस्पृश्यांना शेतकरी ही फुकटची पदवी बहाल करावयाची असली तर गाय, बैल, म्हशी, रेडे, बकरे इत्यादींना शेतकरी कां म्हणूं नये? ह्या जनावरांना मराठे शेतकरी “लक्ष्मी” ह्या गोड नांवानें संबोधतात. निदान मद्रासकडच्या शेतावरच्या गुलामांना “लक्ष्मी” ऊर्फ Live Stock  हें नांव देण्यांत मला कोणतीही अतिशयोक्ति वाटत नाहीं. इतर इलाख्यांत अस्पृश्य समाज ही फार तर शेतीवरचा बिनमुदतबंदीचा मजूर असेल. त्याला शेतकरी म्हणणें हें त्याच्या दुःखावर डाग देण्याप्रमाणेंच कठोर अज्ञान आहे !
शेतकीचा प्रश्न अर्थशास्त्राचा आहे. अस्पृश्यतेचा प्रश्न हा सामाजिक, धार्मिक व विशेषतः राजकीय जुलमाचा आहे. एकषष्ठांश भारत मी म्हणतों कीं तुरुंगाचे दारांत नव्हे तर प्रत्यक्ष सामाजिक तुरुंगांतच आहे. मग कैद्यांपुढें अर्थशास्त्राच्या गप्पा सांगितल्यास ते म्हणतील कीं आम्हांला मोकळ्या मैदानांत सोडा म्हणजे तुमच्यापेक्षांहि अर्थशास्त्रावर अधिक लांब व्याख्यानें आम्ही झोडूं. हें खोटें काय? मद्रासेकडे तामिळ नाड, तेलंगणांत असे किती तरी जिल्हे मी दाखवून देईन कीं त्यांत पारिआंना जमीनदार तर नव्हेच पण लहानसान कुणबीहि होणें शक्यच नाहीं. इ. स. १८४४ चे सुमारास लॉर्ड एलनबरोचे कारकीर्दींत हिंदुस्थानांत नामधारी कायद्यानें गुलामगिरी बंद केली. पण इ. स. १९१८ सालीं मी मलबारांत प्रवास करीत असतां कालीकत येथील माझ्या एका जमीनदार मित्रानें सांगितलें कीं त्याच्या इस्टेटीवर शेंकडों “अस्पृश्य” वंशपरंपरागत दास ऊर्फ लक्ष्मी होते. आपल्या इस्टेटीवर काम नसतांना तो त्यांना गुरांप्रमाणें दुस-याच्या शेतांत भाड्यानें पाठवीत असे ! जमिनीबरोबर दासांची विक्री होते. ते पळून जुन्या मलकांकडे आल्यास मलबारांतील ब्रिटिश कोर्टांत दावा लावून आंद्रोक्लीजाप्रमाणें त्याला पकडून नव्या इस्टेटीवर डांबतां येतें ! अशा मद्रासी आंद्रोक्लीजाला हल्लीं चालूं असलेल्या डोहाळ जेवणांतील उष्टावळीची तरी आशा करतां येईल काय? वरील सालींच मद्रासेंत तंजावर जिल्ह्यांत मी दौ-यावर असतांना कांहीं पारिआंना सरकारकडून जमीन वाहण्याचा हक्क सवलतीनें देण्यांत आला होता. कळ्ळर (ह्याचा अर्थ द्राविड भाषेंत चोर असा आहे.) नांवाचा ब्राह्मणेतर जमीनदारांचा एक वर्ग तिकडे आहे. त्यांचा व पारिआंचा ह्या नवीन हक्काच्या बाबतींत घनघोर तंटा लागला होता. लॉर्ड पेंटलंड हे त्या वेळीं गव्हर्नर होते. त्यांच्या अनुमतीनें ह्या तंट्याचें इंगित स्वतः निरखण्यास मी गेलों. तेव्हां तेथील एका स्वराज्यवादी ब्राह्मण वकिलानें जमीनदारांचा पक्ष घेऊन मला असा स्नेहाचा सल्ला दिला कीं मी ह्या भानगडींत न पडतां जीव घेऊन मुकाट्यानें स्वदेशीं जावें.
ह्यावरून अस्पृश्यांनीं शेतकींत लक्ष घालूं नये, असें माझें मुळींच म्हणणें नाहीं. मुद्दा हा आहे कीं जेथें जमीन वाहण्याचा तात्त्विक हक्क अस्पृश्यांना नाहीं, तेथें तपशिलाचें प्रदर्शन त्यांना दाखवून काय उपयोग ? चालू प्रदर्शनांत कांहीं धारवाडी व सिंधी जनावरें ठेविलीं आहेत असें ऐकतों. त्याप्रमाणेंच कांहीं मलबारांतील चिख्मा व त्रिचनापल्लीकडचे पळ्ळर आणिले असते तर ते औताचे कामीं किती उपयोगी आहेत हें पाहण्यासाठी आमच्या पुणें मिशनच्या सर्व सभासदांना मीं सुचविलें असतें. असो. केवळ शेतकीच्या दृष्टीनें पाहतां बंगाल्यांत, मध्यप्रांतांत व महाराष्ट्रांत अस्पृश्यांची स्थिति इतर कांहीं प्रांतांपेक्षां थोडी बरी आहे. पण येथेंहि त्यांना शेतीवर इतर स्पृश्य मजुरांबरोबर मजुरी खात्रीनें मिळेलच अशी कोणी खातरजमा देईल ? एकादा इलेक्शनसाठीं उभा असलेला उमेदवार देईल. पण त्यावर अस्पृश्यांनीं विश्वासण्याचें कारण नाहीं. न जाणो, नवीन शेतकी कमिशनच्या फुकट्या शिफारशीवरून साम्राज्य सरकार मजुरी वाढविण्याचा एकादा कायदाहि पास करील. पण ज्या इंग्रजांना आपल्या घरच्या मजुरांची करुणा येत नाहीं त्यांनीं इकडील मजुरांना डोक्यावर घेऊन थोडा वेळ नाचल्यानें शेती सुधारेल काय ? कीं अस्पृश्याती कमी होईल ?
“अस्पृश्य” वर्गाच्या शेतकी परिषदेंत अस्पृश्यता ही प्रधान आणि शेतकी ही गौण गोष्ट आहे ही वरील मुद्द्याची गोष्ट आपल्या ध्यानांत आणण्याचा मीं थोडक्यांत प्रयत्न केला आहे. जमिनीच्या मालकी हक्काला किंवा वाहतुकीला महाराष्ट्रांत तरी कायदेशीर प्रतिबंध नाहीं. अडचण आहे ती दारीद्र्याची व धंदेवाईक सवलतीची. इ. स. १९१४ सालीं सातारा जिल्ह्यांत मांग लोकांची वसाहत करण्यासाठीं मुंबई सरकारनें आमच्या मिशनला एक हजार एकर पडिक जमीन लागवडीस देण्याचें कबूल केलें होतें. पण जमीन शोधण्यासाठीं मी आणि खुद्द डॉ. मॅन त्या जिल्ह्यांत शेंकडों मैल हिंडलों. मराठ्यांच्या शिवेची जमीन मराठ्यानें किंवा ब्राह्मणाच्या शिवेची जमीन ब्राह्मणानेंच आपल्याकडे दाबून ठेवावी किंवा त्यांच्याकडेच असावी हें सरकारी वसुलाचे दृष्टीनें किती साहजिक होतें हें व्यावहारिक शहाणपण मी तेव्हां शिकलों ! कायद्यांतलें व परोपकारांतलें पुस्तकी शहाणपण जमीनशिवारांत वावरतांना फारसें उपयोगी पडत नाहीं. ही गोष्ट शेतकी कमिशनच्या परकीय सभासदांना समजणार नाहीं, व स्वकीय पांढरपेशांना सांगून आम्ही आपला वेळहि घालवूं नये हेंच बरें. सदाशिव पेठेंत मांगाला घर भाड्यानें मिळण्याला हल्लीं कायद्याची आडकाठी नसली तरी तें मिळणार नाहीं. तशीच शेतांत सोवळ्या वशिल्याच्या मालकाच्या हद्दीला महारामांगाला सवलतीनें जमीन मिळावयाची नाहीं. ती पडिक झाली म्हणून काय झालें ? अस्पृश्य जात तिच्याहूनहि किती तरी अधिक काळ पडिक आहे !
अस्पृश्य शेतक-यांची गोष्ट राहोच. पण हिंदुस्थानांतील अगदीं अस्सल क्षत्रिय शेतक-यांनाहि चांगले दिवस यावयाचे, आसल्यास ते असल्या शेतकी कमिशनमुळें न येतां, सक्तीच्या शिक्षणामुळेंच येणार. मग त्यासाठीं कर बसविण्याइतकें हिंदी पुढा-यांनीं निर्भीड झालें पाहिजे; हें आतां शाळेतील मुलांनाहि कळूं लागलें आहे. पण हें काळ्या गो-या नोकरशाहीच्या मात्र गळीं कधीं उतरेल तें उतरो. मला तर वाटतें कीं, हिंदुस्थानसारख्या मागासलेल्या व दुहीनें सडलेल्या देशांत शेतकीच्या भरभराटीचा प्रश्न केवळ अर्थशास्त्राच्या पोकळ तत्त्वांवर किंवा प्रदर्शनाच्या परकीय भपक्यावर अवलंबून नसून तो सामाजिक शिक्षणावर व हितसंबंधाच्या सहकार्यावर जास्त अवलंबून आहे. ही जर प्रत्यक्ष स्पृश्यांची स्थिति मग अस्पृश्यांची कोण वाट !
परवां शेतकी कमिशनपुढें भारतीय शिक्षणमंत्र्यांची जी साक्ष झाली तिच्यांत त्यांनीं शेतकीच्या दृष्टीनेंहि सक्तीच्या शिक्षणाची किती आवश्यकता आहे हें निर्भीडपणें सांगितलें. शेतकींत अधिक पैदाशी करून वाढलेल्या पैदाशीचा खप योग्य वेळीं करून आपला फायदा करून घ्यावयाचा असेल तर हिंदी शेतक-यांची हल्लींची मनोरचनाच बदलली पाहिजे. ती सक्तीचे शिक्षणाशिवाय होणें नाहीं. अस्पृश्य वर्गासंबंधीं तर ही गोष्ट अधिकच खरी आहे. ह्या दुर्दैवी वर्गावर आज हजारों वर्षें अस्पृश्यतेची मूठ मारण्यांत आली आहे. त्यामुळें त्यांना स्वतःचें असें मनच उरलें नाहीं. संन्याशाच्या लग्नाची जशी शेंडीपासून तयारी, तशी अस्पृश्यांच्या उन्नतीची त्यांच्या मनापासून तयारी करावयाची आहे. वरवर पाहतां असें दिसतें कीं शेतक-यांचीं मुलें लिहावयास शिकलीं म्हणजे त्यांचें लक्ष शेतकीवरून उडतें. पहिल्या पिढींत असें होणार हें जाणूनच शिक्षणाचा तोडगा तसाच चालविला पाहिजे. फार दिवस हाडींमांसीं खिळलेल्या रोगांचीं लक्षणें अशीं उलटीं असणारच. त्यांतूनच उपाय करणा-यांनीं चिकाटीनें मार्ग काढणें आवश्यक आहे. ह्यांचा विशेष विचार आपल्या शिक्षण परिषदेंत होईल अशी मला आशा आहे.
शेवटीं पुन्हा एकदां आठवण करून देतों कीं महाराष्ट्रांत अस्पृश्यांची जमीनमालकीसंबंधीं स्थिति इतर प्रांतांतल्यापेक्षां किंचित बरी आहे. मराठे आणि महार हे दूरचे चुलत बंधु असल्यासारखे आहेत. त्यांत महारांना थोरल्या घरचे हें नांव आहे. पण तेवढ्यावरून इतर अस्पृश्यांचें मूळ कमी दर्जाचें असें मुळींच माझें म्हणणें नाहीं. अस्पृश्य हेच महाराष्ट्र ऊर्फ दंडकारण्याचे मूळ मालक. मराठे हे केवळ उपरे. मूळ मालक तो आज केवळ पहिल्या नंबरचा बलुतेदार झाला आहे ! जमिनीच्या शिवेचा तंटा लागल्यास महारांचा निकाल पूर्वीं शेवटला समजत असत. कोंकणांत अद्यापि गांवकरी महारांना पागोटें बांधून त्यांच्या मूळ हक्काची दरसाल आठवण करून देत असतात. म्हणून तुम्ही सर्वांनीं आपल्यांत दुर्भेद्य एकी करून जमिनीवरील आपली गेलेली सत्ता पुनः मिळविली पाहिजे. ह्या कामीं ब्रिटिश सरकारची झाली तर मदतच होईल. प्राचीन परंपरेचें महत्त्व हें सरकार जाणतें; आमचेकडे जशीं तुळशींचीं लग्नें होतात तसाच एक चमत्कारिक विधि मद्रासकडील तामिळ देशांत अद्यापि रूढ आहे. त्यांत भूदेवीचे गळ्यांत लग्नाची ताळी बांधावयाची असते; ती बांधण्याचा हक्क गांवच्या पारियाचाच असतो. ह्यावरून तोच पूर्वींचा बळीराजा पृथ्वीपति हें उघड होतें. परंतु नुसती परंपरेची पोथी वाचून सरकार वळेल असें नाहीं. सरकार म्हणजे कांहीं धर्मादाय खातें नव्हे. तें बिनहिशेबी व्यवहार कधीं करणार नाहीं. सरकारजवळ अजूनहि पडिक जमीन पुष्कळ पडली आहे. उत्तर हिंदुस्थानांतील शिंदे, होळकर इत्यादि संस्थानिकांजवळ तर अशा जमिनींचे अफाट प्रदेश पडले आहेत. चालू धामधुमीची संधि साधून पाश्चात्य भांडवलवाल्यांनीं चहा कॉफीचे विषारी मळे लावून आपले हातपाय पसरल्यावर तुम्ही तेथें मुदतबंदी मजूर म्हणून जाणार काय ? लहान लहान प्रमाणावर ह्या जमिनीचे तुकडे नांगराखालीं आणून तुम्ही स्वतंत्र रयत झाल्यास तुमचा, सरकारचा व सर्व देशाचाहि फायदाच होणार आहे. हा विषय तुमच्या पुढा-यांनीं शेतकी कमिशन येथें आल्यावर त्याच्यापुढें अवश्य ठेवण्यासारखा आहे.
माझ्या व इतर सहका-यांच्या हातून आजवर जे अल्पस्वल्प प्रयत्न तुमच्यासाठीं झाले आहेत त्यांत म्हणण्यासारखें यश आलें नसलें तरी अनुभव आले आहेत, त्यांची किंमत कमी नाहीं. ते तुम्हांस सादर करण्यास आम्ही सदैव तयार आहों. आतां तुमचें मिशन सर्वस्वीं तुम्हांवर तुमच्याच मागणीवरून सोंपविण्यांत आलें आहे. त्यांत तुम्हांला अत्यंत कष्ट पडत आहेत हें मी जाणून आहे. परंतु ह्या व्यायामाचा तुम्हांला अति फायदाच झाल्याचें आढळून येईल. शेतीमध्यें ज्या निरनिराळ्या खतांचा उपयोग होतो, त्या सर्वांत निढळाच्या घामाचें खत अत्यंत श्रेष्ठ दर्जाचें ठरतें. ह्यांत कसूर उपयोगी नाहीं. हल्लीं ज्या फुकट सवलती मिळविण्याच्या शर्यती चहूंकडे चालूं आहेत त्यांच्यांत तुम्ही सामील होऊं नका. अशा सवलती मिळाल्यांचें न मिळाल्यांचेपेक्षांहि अधिक नुकसान झाल्याचें योग्य वेळी आढळल्याशिवाय राहात नाहीं. अर्थात तुमच्या दुर्बल स्थितीमुळें विशेषतः ती स्थिति इतरांच्या अन्यायामुळें आली असल्यानें तुम्हांला कांहीं सवलती सढळ हातांनीं देणें न्याय्यच नव्हे तर अत्यंत आवश्यकहि आहे. पण ह्याहि सवलती तुम्ही कर्जाऊच म्हणून घेण्यांत आपला बाणेदारपणा दाखवाल अशी मी आशा करतो.

अशोक आणि वैष्णव धर्म

प्रसिद्ध सम्राट् अशोक हा महान् बौद्ध भागवत होता हें खरें. त्यानें राजाश्रय दिला नसता तर बौद्ध धर्म सर्व आशिया खंडांतच नव्हे पण भरतखंडांतहि जितका पसरला तितका पसरला नसता. ज्यानें प्रत्यक्ष आपल्या युवराज मुलाला आणि मुलीलाहि भिक्षूची दिक्षा देऊन त्यांना संचारासाठीं सिंव्हलद्वीपांत पाठविलें आणि ज्यानें सर्व आशिया खंडभर चहूंकडे बौद्ध प्रचारक पाठवले, त्याची बुद्धभक्ति काय वर्णावी! पण ह्या भक्तीचा विपरीत परिणाम अशोकाच्या कुळालाच नव्हे तर हिंदुस्थानांतील बौद्ध धर्मालाहि भोगावा लागला हें (इतिहास पुढें प्रांजलपणें ज्याला सांगेल तेव्हां सांगो) तूर्त तरी एक कटु सत्य आहे येवढें खरें. अकबरानें सर्व धर्माना विशेष हिंदु धर्मांला जवळ केलें म्हणून पुढें त्याच्या मुलानातवांच्या वेळीं आणि विशेषत: औरंगजेबाच्या वेळीं जसे हिंदूंचे हाल झाले, तसेंच किंबहुना जास्त मगध राजवटींत बौद्ध धर्माचे हाल झाले. कारण अशोकामागून जे राजे त्याचे गादीवर बसले ते अनत्याचारी, व कदाचित् दुर्बळ निघाल्यामुळें पुष्यमित्र नांवाच्या एका सेनापतीनें त्याचें राज्य बळकावून मोठ्या जोरजबरीनें ब्राह्मण धर्माचा प्रचार चालविला. त्याच्या घराण्याचें नांव शुंग घराणें असें होतें. ह्यानें फार अनन्वित कृत्यें केलीं. विशेषत: त्यानें मौर्य घराण्यांतील व बौद्ध धर्माचा प्रसार करणा-या इतर राजकुलांचा भयंकर उच्छेद मांडिला. शुंग घराणें कण्व नांवाच्या ब्राह्मण मंत्र्यानें बुडवून त्याचें राज्य बळकाविलें. त्याचें घराणें फार अप्रिय झालें म्हणून त्याचें राज्यहि फार दिवस टिकणें अशक्य झालें. पुढें ह्या कण्व घराण्याचा कलिंगच्या खारवेल नांवाच्या महाप्रतापि शैव-जैन राजानें पराभव केला. शेवटीं दक्षिणेंत आंध्रभृत्यांचें साम्राज्य स्थापन झाल्यानें मगध साम्राज्याचा अस्त झाला. तथापि ह्या धामधुमींत वैष्णव धर्माचा बराचा जम बसला हें खरें. महाभारताची सुधारून वाढविलेली आवृत्ति निघाली. अश्वलायन गृह्यसूत्रांत ज्याचा भारत ह्या नांवानें उल्लेख आहे, त्याचे पुढें महाभारत होऊन त्याचीहि झपाट्यानें हल्लींच्या प्रचंड महाभारतांत वाढ होऊं लागली, ती ह्याच बौद्धांच्या व जैनांच्या उलट उठविलेल्या धामधुमीच्या काळीं झालेली असावी, असा पुष्कळ ति-हाईत विद्वानांचा तर्क आहे. ही सर्व वाढ नुसती बौद्ध– जैनांच्याच नव्हे तर त्यांच्याहून जुनाट असलेल्या शैव धर्माच्याहि उलट होती. महाभारतांत शिवदेवतेचा पुष्कळ गौरव करण्यात आला आहे. कदाचित् मूळ भारत नांवाचें महाभारतांत रूपान्तर शिव भागवतांनींच किंवा सात्वतांनीं केलें. श्वेताश्वेतर-उपनिषद्कर्ते आणि पुढील पतंजलि भाष्यकार ह्या शिव भागवतांतलाच होता. पुढें मौर्य कुलाचा उच्छेद करून शुंग नांवाचें ब्राह्मणी साम्राज्य मगध देशांत सुरू झालें तेव्हां महाभारताचा शैव स्वरूपांतून हल्लींच्या वेष्णव स्वरूपांत प्रचंड विस्तार झाला. पण शांतिपर्व, अनुशासन पर्व इत्यादि अवाढव्या नवीन पर्वांची भर पडून वासुदेव कृष्णाचेच नव्हे तर तो ज्याचा अवतार कल्पण्यांत आला, अशा काल्पनिक विष्णु देवाचेहि नवीन देव्हारे पसरविण्यांत आले. ह्या धामधुमींत बौद्धांच्या पाली वाङ्मयाला तोंड देण्यासाठीं महाभारताचीच नुसती वाढ नव्हे, तर कित्येक नवीन स्मृत्या व निरनिराळ्या सात्वत संहितेसारख्या सांप्रदायिक भागवत संहिताहि संस्कृतांत निर्माण झाल्या. मौर्य साम्राज्य आणि त्याचा बौद्ध धर्माला आश्रय चालूं राहिला असता तर वैष्णव सांप्रदाय कदाचित् अस्तित्वांतहि आला असतां कीं नसतां ह्याची शंका आहे. ह्या साम्राज्यक्रांतीनंतर कित्येक हिंदी राजवटींतील कित्येक प्रसिद्ध पुरुषांनीं वैष्णव धर्म स्वीकारून मथुरेंतील व मध्य हिदुंस्थानांतील इतर देवळांना इमारती, जयस्तंभ वगैरे स्मारक देणग्या दिल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.

अमेरिकेंतले शेतकरी

अमेरिकेसारख्या देशांतील शेतक-यांनीं केवळ जमिनीवरच नव्हे तर देशाच्या व्यपारावरहि आपला ताबा राखला आहे. ते कच्चा माल नुसता तयार करून दुस-याचीच, केवळ तुमच्याप्रमाणें भर करीत नाहींत; तर तो कोठें कसा जातो हें पाहण्यासाठीं उतारपेठेवरहि आपला ताबा चालवितात. कच्च्या मालाची केव्हां किती किंमत असावी हें ठरविणें अमेरिकेंत शेतक-यानें आपलें हातीं ठेविलें आहे. परवां दोन कोटी डॉलरचा (२||रु. = १ डॉलर) कापूस अमेरिकेंतील शेतक-यांनीं जाळून बाजारांत त्याची किंमत राखली असें मीं कोठेंसें वाचल्याचें आठवतें. ह्यालाच म्हणावें शेतकरी ! इतर ते नुसते भारवाही !! पण अमेरिकेंतील शेतकरी हा केवळ कुणबी नसून तो एक प्रकारचा जमीनदार व भांडवलदार बनला आहे. खरे कष्ट तेथें तुमच्या आमच्यासारखे काळे शिद्दी लोकच करतात. म्हणून अमेरिकेचें उदाहरण तुम्हीं जसेंच्या तसेंच गिरवावें असें माझें म्हणणें नाहीं. आमची परिषद तालुक्यापुरतीच आहे म्हणून तुम्ही तालुक्याची तरी उतारपेठ आपल्या ताब्यांत घेण्याच्या मार्गास लागा. खरें पाहिलें तर अशी शेतक-यांची संघटना सर्व देशभर होणें जरूर आहे.

अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २

तीर्थरूप अण्णांचा मी धाकटा मुलगा. माझ्या पाठची बहीण लहानपणींच १९२० सालांत वारली. त्यामुळें अण्णांचा माझ्याकडे ओढा लागला. म्हणूनच बालवयांत माझा अण्णांचेबरोबर हुबळी, बंगलोर, मंगळूरपासून ते कलकत्ता, नागपूर वगैरे भागांपर्यंत प्रवास घडला. याच कारणानें त्यांच्या साप्ताहिक प्रार्थना, उपासना, नैमित्तिक सभा-संमेलनांसारख्या समारंभात माझी उपस्थिति होत असे. इतकेंच नव्हे तर १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळींत अण्णांनी जे दौरे काढले त्यांमध्येंहि मला त्यांनीं आपल्याबरोबर नेलेलें होतें !
पुष्कळसा पत्रव्यवहार ती. अण्णा मजकरवींच करून घेत. त्याचप्रमाणें वृत्तपत्रांत छापण्यासाठीं म्हणून जो कांहीं व्याख्यानाचा मजकूर असे तो ते स्वत: मलाच कथन करीत आणि मी तो लिहून काढीत असे. याच पद्धतीनें त्यांनीं आपल्या आत्मचरित्राचा समग्र मजकूर मला कथन केला आणि तो मी लिहून काढला. असें करण्यांत कदाचित् त्यांचा हेतु एवढाच असावा कीं, माझें सामान्यज्ञान वाढावें, आणि शालेय भाषेपेक्षां अधिक भाषावृद्धि व्हावी. १९४० सालानंतर ती. अण्णा वार्धक्याने आणि मधुमेहाच्या विकारानें अधिकच दुर्बल झाले. त्यांची प्रसिद्धिपराङ्मुख असल्यानें चरित्राच्या बाबतींत मींच नेट धरून तें कसेंबसें तडीस नेलें. त्यामुळें समग्र आत्मचरित्र पुस्तकरूपानें प्रकाशित पहाण्याचें भाग्य कांहीं त्यांना लाभलें नाहीं. ही खंत मला लागलेली असावयाची व ती मी वारंवार त्यांचेजवळ व्यक्त करीत असे. तेव्हां ते माझ्या भावुकतेची आल्यागेल्यादेखत टरच उडवीत.
ती. अण्णांची वृत्ति अतिशय शिस्तबद्ध तर माझी अगदीं उलट प्रकारची. याकरतां मला पुष्कळदां बोलणीं खावी लागत. प्रस्तुत लेखसंग्रहाबाबतहि असाच एक प्रसंग घडला. अण्णांच्यापाशीं ब-याचसा ग्रंथसंग्रह होता. एक दोन प्रशस्त कपाटांत तो ग्रंथसंग्रह सामावलेला असे. पुढें त्याची हयगय आमचेकडून होऊं लागलेली अण्णांच्यानें बघवेना. तेव्हां त्यांनीं तो सारा ग्रंथसंग्रह एका सार्वजनिक संस्थेला तिच्या वाचनालयाकरितां देणगीदाखल देऊन टाकला. कारण ग्रंथसंग्रहाचें वाचन तर दूरच राहो; पण त्यावरील धूळ देखील दूर करण्याचें काम आम्हां दोघां भावांकडून महिनो-महिने कांहीं होत नसे!  म्हणून ग्रंथसंग्रहाची विल्हेवाट ती. अण्णांनी आपल्या डोळ्यांदेखत लावली तें योग्यच झालें. तसाच प्रकार प्रस्तुत लेखसंग्रहाबाबत घडला. हे लेख निरनिराळ्या वृत्तपत्रांतून, किंवा मासिकांतून प्रसिद्ध झालेले होते. हें सर्व छापील लिखाण एका कापडी गाठोड्यांत मी बांधून ठेवलेलें होतें. एके दिवशीं या लेखांच्या गाठोड्यास वाळवी लागल्याचें अण्णांच्या दृष्टोत्पत्तीस आलें. अण्णांनीं माझ्यावर जो गहजब केला तो मलाच ठाऊक. इतकेंच नव्हे तर दुसरे दिवशीं हें सारें लेखसंग्रहाचें बोचकें देखील सार्वजनिक वाचनालयास देण्याकरतां म्हणून जेव्हां अण्णांनी त्या वाचनालयाचे व्यवस्थापकांस बोलावलें तेव्हां मात्र मला राहवेना. अगदीं गयावया करून मी ह्या लेखांचें बोचकें त्या इसमाचे हातून घरीं आणून ठेवलें अन् अण्णांचेजवळ आणाभाका वाहून त्यांचे योग्य प्रकारें जतन करण्याचें मी अभिवचन दिलें. ह्या वचनास मीच नव्हें तर माझे गैरहजेरींत माझे बंधु श्री. प्रतापराव देखील अक्षरश: जागले. हेंच आमचे परी एक मोठें कार्य म्हणावें लागेल.
आत्मचरित्राच्या प्रकाशनाबाबत किती अडचणी आल्या, त्यांत किती यातायात झाली, किती निराशा पदरांत पडली, तें मींच जाणें. तेव्हा ह्या छापील लेखांचें प्रकाशन कधीं काळीं होईल अशी मला चुकूनदेखील कल्पना नव्हती. परंतु आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे बाबतींत जसा श्री. ठोकळ यांनीं मला दिलेला आपला शब्द पुरा केला, तसाच या लेखसंग्रहाच्या बाबतींत देखील पुरा केल्यांनें माझ्या आनंदास आणि आश्चर्यास पारावार राहिला नाहीं. चालूं महागाईच्या काळांत देखील श्री. ठोकळ यांनीं अण्णांच्या लेखसंग्रहाच्या पुनर्मुद्रणाचें खर्चिक काम यथोचित रीत्या तडीस नेलें याबद्दल मीं त्यांचा शतश: आभारी आहे. त्याचप्रमाणें श्री. ठोकळांच्या इतकीच आगळी आस्था बाळगून अण्णांच्या लेखांचें संकलन व त्यांना परिशीलनपूर्वक प्रस्तावना लिहिण्याचें जें महत्कार्य प्राचार्य मा. प. मंगुडकर यांनी केलें, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यांत मी माझा बहुमान समजतों.
ती. अण्णांच्या आत्मचरित्रावरून लोकांना त्यांच्या एकंदर जीवनाबद्दल इत्थंभूत माहिती मिळेल, तर या लेखसंग्रहावरून त्यांचे विचार कसे होते, त्यांची वृत्ती कशी होती, त्यांची राजकीय, सामाजिक आणि धार्मिक दृष्टि कशी होती, याचा सुगावा लागेल, असा भरंवसा वाटतो. पण हें सांगणें देखील लहान तोडीं मोठा घांस घेण्यासारखेंच वाटतें.
रवींद्र विठ्ठलराव शिंदे

  1. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  2. अखिल भोर संस्थान प्रजापरिषद
  3. ''भागवत'' शब्दाचा इतिहास
  4. समाजशास्त्र
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
  • 85
  • 86
  • 87
  • 88
Page 84 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी