प्रकरण ७ वें
१८८५ सालीं मी १२ वर्षांचा व माझा भाऊ १७।१८ वर्षांचा झाला होता. ह्या सालाच्या आरंभीं माझी मराठी ५ वी यत्ता संपून मी इंग्रजी पहिल्या यत्तेत हायस्कुलांत गेलों. एव्हांपासून माझ्या आयुष्यांतील नवीन एक टप्पा सुरू झाला. माझें बाळपण संपलें आणि विद्यार्थी दशेला प्रारंभ झाला म्हणावयाचा.
नवीन टप्पा
माझ्या मराठी शाळेंत माझे गणित व भाषा वगैरे अभ्यास त्या वेळच्या शिक्षणाच्या मानानें बरे होते. मराठी शाळेचे हेडमास्तर विष्णुपंत गवंडे फार कडक होते. तरी माझी तरतरी पाहून ते मजवर प्रेम करीत असत. चौथ्या यत्तेंत मास्तर अंताजीपंत पोंक्षे नांवाचे होते; तेही प्रेम करीत असत. त्यावेळीं ब्राह्मणेतरांचीं मुलें सरकारी शाळेत फारच कमी असत, त्यामुळें व मी हुषार म्हणून कोणीही माझें कौतुकच करीत. पण दुस-या यत्तेंत असतांना दत्तोपंत बेडेकर नांवाचा एक मास्तर फार तिरसट असे. त्यानें मात्र एके दिवशीं मला अतिशय मारलें होतें. त्यामुळें मांडींतून रक्त येत असतांना मी घरीं आलों. हें पाहून माझे बाबा शाळेंत आले व त्यांनी त्या मारकट मास्तराचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळें पुढें सगळ्याच मास्तरांवर दाब बसला. माझ्या वडील भावाची प्रगति मात्र शाळेंत मुळींच होईना. हें एक कारण बाबांनीं त्याला नेहमीं बोलण्याचें व मारण्याचें होतें. इंग्रजी शाळेच्या अभ्यासांत इंग्रजी शब्द पाठ करण्याचा व विशेषतः त्यांच्या स्पेलिंगचा मला भारी कंटाळा येई. इतका कीं त्यामुळें मला इंग्रजी शाळा नकोशी वाटूं लागली. आबा म्हैसकर नांवाचा एक ब्राह्मण मास्तर पहिल्या यत्तेवर होता. तो स्पेलिंग नुसतें पाठ करावयाला लावी मग तें इतके नकोसें होई कीं पुष्कळ वेळां मला जीव द्यावा असें वाटे! घरीं किंवा शाळेंत मला मदत करावयास कोणीच नव्हतें. ह्यावेळीं आमच्या घरीं एक अरिष्ट घडलें. इ. स. १८८५ मध्यें जमखंडींत पटकीचा उपद्रव सुरू झाला. आणि अगदीं सुरवातीलाच माझा तरुण भाऊ १।२ दिवसच आजारी पडून एकदम वारला. तो शान्त व समजूतदार होता. म्हणून शेजा-यांना व नातलगांना माझ्यापेक्षां तोच जास्त आवडत असे. बाबा त्याच्यावर राग करीत म्हणून आईला तो अधिक आवडत असे. तो असा एकाएकीं वारल्यामुळे माझे आईला व बाबांलाही एकदम फारच मोठा धक्का बसला. आईनें तर पुढें ५।६ वर्षे अतिशय शोक केला.
बंधु एकनाथ
माझा भाऊ वारल्यावर सुमारें पांच वर्षें आम्ही अत्यंत भयंकर दारिद्र्याचें हाल सोसले. इ.स.१८८५ च्या डिसेंबर महिन्यांत माझा धाकटा भाऊ एकनाथ हा जन्मला. ह्यापुढची, किंबहुना माझी धाकटी बहीण मुक्ताबाई हिच्या पाठीवरचीं मुलें जन्मतःच फार अशक्त जन्मलीं. जन्मतः एकनाथही अशक्त व किरकि-या होता. आईच्या अंगावर दूध मुळींच नव्हतें. कोठून असणारॽ भाऊच्या मरणाच्या शोकानें तिचें सारें रक्तही जळून गेलेले, मग दूध कोठून असणार. अशा स्थितींत धोंडूबाई नांवाची एक गवळण आईचे ओळखीची होती. तिला ह्या मुलाची करुणा आली. ती रोज त्याच्यापुरतें म्हशीचें ताजें दूध फुकट देत असे. एरव्हीं एकनाथ हा वांचलाच नसता. भाऊ वारल्यावर मीच सर्वांत वडील अपत्य झालों. तेव्हांपासून माझा पोरकटपणा जाऊन स्वभावांत एकदम फरक पडला. आमच्या घरच्या करुणास्पद स्थितीची मजमध्यें एकदम जाणीव उत्पन्न झाली. मी बारा वर्षांचा होतों, मला सर्व कळूं लागलें. भावाचा मलाही शोक होत होता. त्यावेळीं मी कसलीशी एक कविता रचली होती व दत्तात्रयावर एक आरती रचली होती.
माझ्या ह्या स्वभावांतील एकदम पडलेल्या फरकामुळें आईबाबांना माझें मोठें कौतुक वाटूं लागलें. नुसता स्वभावांत गंभीरपणा व समजूत उत्पन्न झाली इतकेंच नव्हे तर शाळेत माझा अभ्यासही उत्तम होऊ कौतुक वाटू लागले. नुसता स्वभावांत गंभीरपणा व समजूत उत्पन्न झाली इतकेंच नव्हे तर शाळेंत माझा अभ्यासही उत्तम होऊन माझी वाहवा होऊं लागली. इ. स. १८८६ साली माझी इंग्रजी पहिली यत्ता पास होऊन दुस-या यत्तेंत गेलों. तेथें गेल्यावर वर्गांत माझा नेहमीं पहिला नंबर लागूं लागला. रोजच्या मार्कांची बेरीज होऊन महिन्याचे शेवटीं नंबर लागत. दुस-या यत्तेपासून मी जों एकदां पहिला नंबर पटकावला, तो अखेर सातव्या यत्तेपर्यंत एक नंबरही खालीं उतरलों नाहीं. एकदां पांचव्या यत्तेंत असतांना यल्लमाच्या यात्रेला गेलों म्हणून काय तो माझा नंबर खालीं गेला. एरव्हीं नेहमीं माझा पहिला नंबर अगदीं ठरलेला. मॅट्रिकच्या परीक्षेला जमखंडी हायस्कूलमधून जितकीं मुलें गेली, त्यातही माझाच नंबर पहिला होता.
चुणचुणीतपणा
पहिल्या यत्तेंत मला जी इंग्रजी भाषा फार अवघड वाटून, अगदीं आत्महत्या करून घ्यावी इतकें वाईट वाटत होतें, त्याच भाषेंत मी सर्व वर्गांत प्रवीण ठरलों. विष्णुपंत गाडगीळ नांवाचे ब्राह्मण मास्तर दुस-या यत्तेवर होते. माझी सर्व विषयांत कायमची तरतरी पाहून ते नेहमीं मजवर फार खूष असत. इतर वर्गांतील सर्व मुलें ब्राह्मणाचीं असून मीच काय तो मराठ्याचा, आणि तोही पहिला; ह्याचें माझ्या ब्राह्मण मास्तरांना मोठें कौतुक वाटे. कोणीही ब्राह्मणांनीं माझा जातिभेदामुळें हेवा किंवा द्वेष कधीं मी शाळेंत असतांना तरी केला नाहीं. भाषांतर पाठमालेच्या धड्यांत मी अगदीं चुणचुणीत उत्तरें देत असे. एकदां मला पक्कें आठवतें कीं, मास्तरांनीं एक प्रश्न केला. तो वर्गांत कोणाला आला नाहीं. मी त्याचें उत्तर बरोबर देईन अशी त्यांची खात्री होती. आणि तसें तें उत्तर चटकन मी दिलेंही. तेव्हां गाडगीळ मास्तरांनीं मला प्रत्येक मुलाच्या तोंडावर थुंकावयास सांगितलें. तें माझ्याच्यानें कांहीं केल्या होईना. पण मास्तरांनीं आग्रहच धरला. तेव्हां मला प्रत्येक मुलापुढें जाऊन किंचीत् थुंकल्यासारखें करावें लागलें. जसजसा मी वरच्या वर्गांत जाऊं लागलों; तसतसे नवीन विषय संस्कृत, बीजगणित, भूमिती, शास्त्रे वगैरे लागू लागलीं. तशाच लेखी परीक्षा सुरू झाल्या. पण सर्वांत पृथक पृथक माझाच नेहमीं नंबर पहिला असे. त्यामुळें सर्वच मास्तरांचा व विद्यार्थ्यांचा मी आवडता झालों होतों.
चिमुकली स्कॉलरशिप
हायस्कुलांतील प्रत्येक वर्गांत असतांना पहिल्या दोन मुलांना दरमहा एक लहानशी स्कॉलरशिप मिळत असे. दुस-या इयत्तेंत १–१॥ रुपयापासून ती सातवे इयत्तेंत ३ रुपयेपर्यंत होती. अर्थात् मला नेहमीं पहिल्या नंबरची स्कॉलरशिप मिळे. ह्यावेळीं घरीं तर भयंकर दारिद्र्य असे. माझ्या चिमुकल्या स्कॉलरशिपचीच घरीं मोठी मदत असे. त्यावेळीं जमखंडींत मोठी स्वस्ताई असे. एकंदर १ रुपयाला १६ पायल्या धान्य झालेलें मला आठवतें. मग माझ्या चिमुकल्या स्कॉलरशिपकडे माझ्या आईचे डोळे लागून राहात, ह्यांत नवल काय ! इतकी जरी स्वस्ताई होती तरी आमचे घरीं उत्पन्न नसल्यानें आई आम्हां चार मुलांचे, बाबांचे व आपले प्राण कसे राखीत असे ते आईलाच ठावें किंवा देवाला ठावें ! अर्थात् तिला बाजारांत सर्वांत मिळेल तितकें वाईट व स्वस्त धान्य व भाजीपाला तसलाच आणावा लागे. पुष्कळ वेळा पेवांत बरेच दिवस ठेवून बिघडलेले जोंधळे बाजारात विकावयास येत. ते फार स्वस्त म्हणून आई तेंच नेमकें आणी. त्याचा वास वाईट येई, पण आम्ही मुलें त्याच्याच भाकरी गोड करून खात असूं. कारण गोडी धान्यांत नसून आमच्या आईच्या हातांत विशेषतः तिच्या निर्मळ वाणींत असे. असल्या दाण्याची भाकरी, तसल्याच तुरीच्या डाळीचें वरण व तांबड्या मिरच्याची चटणी हे तीन पदार्थ आम्हांला बासुंदीपुरीसारखे गोड लागत. आमचें लक्ष अन्नाकडे जाऊं नये म्हणून आई आपल्या लहानपणींच्या माहेरच्या व सासरच्या करुणास्पद कहाण्या सांगत असे. त्या आमच्या काळजांत इतक्या खोल जात कीं आमचें जेवण आटपून आमचे हात वाळले तरी आम्हांला भान रहात नसे. पुष्कळ वेळां हें कदान्नहि आम्हांला पुरेसें मिळत नसे. बालूबाई नांवाची एक कुणबीन पूर्वी आमची स्थिती बरी असतांना आमचे घरीं कामाला होती. पुढें आम्हांला अशी भयंकर स्थिती प्राप्त झाल्यावर त्या प्रामाणिक बाईला आम्हां बाळांचा कळवळा येऊन, कोठलेतरी फार दिवसाचे शिळे तुकडे आणून तिनें हळूच झाकून आईला आणून द्यावे. मग आईनें ते ताकांत अगर वरणांत अगर दोन्ही नसल्यास नुसते पाण्यांत भिजवून आमचेसाठीं ठेवावे. आम्ही सर्व मुलें शाळेंतून भूक, भूक म्हणत आल्यावर तेंच पक्वान्न खावें आणि पुढें कितीतरी वेळ नुसतीं बोटेंच चाटीत बसावें. आणि आमचा हा अल्पसंतोषीपणा पाहून आईनें आंम्हांला न कळत आंसवें गाळावीं आणि अशा आनंदांत आपली भूक विसरावी !
तुकारामाचा संसार
इतकें झालें तरी, आईनें कधीं कोणाची मजुरी केली नाहीं, कीं कोणाचे दारीं चिमुठभर मीठ मागण्यासाठीं कधीं उभी राहिली नाहीं. तिच्या आईप्रमाणें तीही उंबरठ्याच्या आंतच राही. बाजारहाट, हिशेब वगैरे सर्व आईलाच करावें लागे. वाणी, माळणी, तेलणी, गवळणी आईची कदर ओळखून असत. त्या सढळ हातानें माप देत व पैशांची कधींही जिकीर करीत नसत. एकंदरींत आमचा संसार अगदीं तुकारामबोवाच्या वळणावर चालला होता. फरक इतकाच कीं तुकारामाच्या मुलांना मराठी तरी लिहितां येत होते कीं नाही शंका आहे. पण मी मात्र हायस्कूलमध्यें पहिला नंबर होतो. इतकेंच नव्हे तर माझ्या बहिणीही मुलींच्या शाळेंत लिहिणें, वाचणें, कशिदा काढणें वगैरे शिकत होत्या. दारिद्र्यानें पाठ पुरविली तरी आमच्या घराण्याचा रुबाब कांहीं कमी झाला नाहीं किंवा चालत असलेल्या धार्मिक सामाजिक परंपरेंत खंड पडला नाहीं. एकादशी, शिवरात्री, हरतालिका, गौरी गणपति, रानसटवाई या क्षुद्व दैवतांचीही समजूत माझे आई व बाबा करावयास कधींच चूकले नाहींत. मग नवरात्रासारखे समारंभ चूकत नसत हें सांगावयास नको. नवरात्रांत नऊ दिवस, गणेशचतुर्थी पांच दिवस आमच्या घराचा पुरोहित तम्मणभट्ट डेंगरे, निदान त्याच्या घरचा कोणी लहान मुलगा का होईना, रोज पूजा सांगावयाला यावयाचाच ! नवरात्रांत नऊ दिवस तो रोज सकाळीं ११ वाजतां कांहीं मंत्र म्हणून जात असे. तसेंच नऊ दिवस प्रत्येक रात्रीं मोठी पूजा होऊन थाटानें आरती होत असे. मूठभर कां होईना पुरण घालून आई नैवेद्याचे पांच कानोले करी. ते आम्ही चार भावंडें पूजा आटपल्यानंतर भांडभांडून खात असूं. गणेशचतुर्थीला गणपती पाण्यांत बुडवण्याचे वेळीं ब्राह्मण विहीरीपर्यंत आलाच पाहिजे. दिपवाळींत एकाच पैशाच्या फटाकड्या मी आणि माझी बहीण जनाक्का थांबून थांबून उडवीत असूं. धाकटी तान्याक्का (मुक्ताबाई) नुसतें पाहूनच सुखी होई. हीच आवृत्ति तुळशीचे लग्नाचे वेळीं ! आमची सांपत्तिक स्थिती बरी होती, तेव्हां भरपूर मिळालेली दक्षिणा आठवूनच, आमचे पुरोहितांनीं आपली सर्व परंपरा बिनतक्रार चालविली. नागाचा उपास, हरतालिकेचा उपास, नवरात्राचा असें नाना त-हेचे उपास आई व बाबा करीत. आणि आम्ही बोके त्यांच्या फराळावर हात मारून पुनः दुसरे दिवशीं पारण्याची वाट पाहात त्यांच्या आधीं ताटावर शेंडीला पीळ घालीत व लंगोटीचे शेपूट ओढीत तयार बसलेले !
प्रकरण २७ वें
इंग्लंडांतील प्रचारक पद्धतशीरपणें तयार करण्यासाठीं मॅंचेस्टर कॉलेज या नांवाची केवळ उदार धर्मशिक्षणासाठीं वाहिलेली संस्था ऑक्सफर्ड येथें आहे. मॅंचेस्टर कॉलेज हे मॅंचेस्टर येथें प्रथम निघून लंडन वगैरे ठिकाणीं स्थलांतर पावून आतां ऑक्सफर्ड शहरांत स्वतःच्या कायमच्या इमारतींत चालू आहे. वास्तविक पहातां ही संस्था इ. स. १७५७ मध्यें वॉशिंग्टन ॲकेडमी, या नांवाने वॉशिंग्टन येथे स्थापन झाली. तिचें पुढें १७८६ सालीं मॅंचेस्टर कॉलेज असें रूपांतर झालें. या क्रांतीचे काळीं संस्थापकांचा धर्म व शास्त्र या दोहोंवरही सारखाच विश्वास होता. म्हणजे यांचा धर्म शास्त्रीय व शास्त्र धार्मिक होतें.
अध्यापक वर्ग
पहिले प्राध्यापक जॉन टेलर हे (१७५७-६१ सालीं) होते. इ. स. १८९७ सालापर्यंत प्रसिद्ध डॉ. माटिनो हे प्राध्यापक होतें. त्यानंतर माझ्या वेळीं व नंतरही डॉ. ड्रमंड हे प्रिन्सिपाल होते. हे विद्येनें तसेंच श्रद्धेनें आणि शीलानें फार मोठे गृहस्थ होते. ह्यांच्याशिवाय प्रो. अप्टन (तत्वज्ञान), प्रो. कार्पेन्टर (तुलनात्मक धर्म व पालीभाषा) प्रो. रॉजर्स (Church history ख्रिस्तीसंघाचा इतिहास), प्रो. जॅक्स (समाजशास्त्र आणि Hibburt Journal चे संस्थापक व संचालक) वगैरे जाडे पंडित त्या विषयांचे अध्यापक होते. प्रिन्सिपाल ड्रमंड हे बायबल आणि धर्मशास्त्र शिकवीत. ह्यांपैकीं प्रो. कारपेन्टर हे तुलनात्मक धर्म ह्या माझ्या ऐच्छिक विषयाचे विशिष्ट Tutor म्हणजे माझ्या अभ्यासावर देखरेख ठेवणारे, नेमून दिलेले गुरु असत. यांच्याजवळ मीं पाली भाषा आणि बुद्धधर्माचा विशेष अभ्यास केला. दोन वर्षांचा अभ्यास आटोपून ह्या कॉलेजचा डिप्लोमा मला देतेवेळीं कॉलेजकमिटीकडे प्रो. कार्पेंटरनें मजबद्दलचें जें प्रशस्तिपत्र पाठविलें त्यांत माझ्या खास गुरूनें (डॉ. कार्पेंटरनें) चांगले गौरवपर आणि प्रेमळ उद्गार काढले होते.
पूर्व व पश्चिम
हिंदुस्थानांतील विश्वविद्यालयांप्रमाणें ह्या कॉलेजांत विद्यार्थ्यांची परीक्षारूपी शर्यत लावून त्यांच्या शहाणपणाचा दर्जा ठरवीत नाहींत. नेमून दिलेले खास गुरु आपापल्या शिष्यांना निरनिराळ्या विषयांत त्यांना निबंध लिहिण्यास सांगून त्यांच्या अभ्यासाची आणि विचारविकासाची पारख करतात. वर्षअखेर खास निबंध लिहावयाला देऊन त्यांत दाखवलेल्या हुशारीप्रमाणें प्रशस्तिपत्र लिहून देतात. कॉलेजांत विद्यार्थीही इकडच्याप्रमाणें शेंकड्यांनीं किंवा हजारांनीं मोजतां येण्यासारखा प्रकार मॅंचेस्टर कॉलेजांत नाहीं. एका वेळीं फार तर १५।२० विद्यार्थ्यांहून जास्त नसतात. तेही दोन वर्षांतून विभागलेले असतात. ते दुसरीकडे बी. ए. अगर एम्. ए. होऊन आलेले असतात. अगोदरच कोणत्या तरी गीर्वाण प्राचीन भाषेंत त्यांना पदवी मिळालेली नसेल तर अशा कोणत्या तरी दोन प्राचीन भाषांचा अभ्यास करण्याची ह्या कॉलेजांत व्यवस्था असते. मुंबई विश्वविद्यालयाचा संस्कृतचा बी. ए. असल्यानें मीं येथें पालीचा अभ्यास जास्ती केला.
धर्मपरिवार
मॅंचेस्टर, कॉलेजचें महत्त्व त्यांतील केवळ ठराविक अभ्यासक्रमावर मुळींच अवलंबून नाहीं. ते एक उदार धर्मशिक्षणाचें कुटुंबच होतें. १५।२० विद्यार्थी, पांच सात प्रोफेसर, त्यांच्या मुली, नाती व इतर कुटुंबीय ह्या सर्वांचा धर्मपरिवार म्हणजेच कॉलेज. कॉलेजची इमारत प्रशस्त, नवी आणि सुंदर. अवाढव्य पुस्तकालय, गंभीर व स्वतंत्र उपासनालय आणि त्यांत दर आठवड्याला प्रार्थनेसाठीं जमणारा ऑक्सफर्ड शहरांतील युनिटेरियन समाज असें एक कॉलेजहूनही मोठें कुटुंब होतें. कॉलेजच्या उपासनालयांत प्रोफेसर मंडळी रविवारची साप्ताहिक उपासना चालवीत. त्याशिवाय दर बुधवारीं सायंकाळीं, कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यानें उपासना चालवण्यास शिकावें म्हणून एक साप्ताहिक उपासना व उपदेश तयार करावयाचा असे. तो ऐकून सूचना देण्यासाठीं एका खास प्रोफेसराची नेमणूक आहे.
निबंध व प्रयोग
ह्याशिवाय विद्यार्थ्यांना वक्तृत्वाचे प्रसंग यावेत, मोठमोठ्या विषयावर विचारविनिमय करण्याला अवसर मिळावा म्हणून मार्टिनो क्लब या नांवाची संस्था स्थापन करण्यांत आली होती. प्रत्येक टर्ममध्यें हा क्लब दोनदां भरत असे. त्यांतच वर सांगितल्याप्रमाणें चेटकॉव्ह ह्या रशियनानें रशियांतील धर्मशिक्षण ह्यावर निबंध वाचला. हे मोठे ग्रंथकार असून प्रसिद्ध Socialist व Anarchist होते. ऑक्सफर्डमधील सर्व युनिटेरीयन समाजांतील स्त्रीपुरुषांचा परिचय व्हावा, विचारविनिमय वाढावा, म्हणून वर्षांतून निदान एक तरी, मोठें स्नेहसंमेलन घडविण्यांत येत असे. अशा एका स्नेहसंमेलनात The Romance of Social Reform in India ह्या विषयावर मी एक निबंध वाचला. नुसता निबंधच न वाचतां, “हिंदु-गृहपद्धति व सामाजिक स्थिति” कशी असते हें प्रत्यक्ष दाखविण्याकरितां मध्यम स्थितींतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट करून दाखविली. कांहीं तरुणांना व तरुणींना हिंदी पोषाख देवून हिंदुपद्धतीनें बसविण्यांत आलें होतें. पोषाक, सामान, नकली दागदागिने वगैरे एका दुकानांतून तात्पुरते आणले होते. नवीन लग्न झालेली सूनबाई कोप-यांत भिंतीकडे तोंड करून कशी बसते, जवळ आलेल्या परीक्षेसाठीं तिचा नवरा मोठमोठ्यानें घोकंपट्टी करीत दुस-या कोप-यांत कसा बसतो, कोणी वडीलधारें माणूस अवचित आल्यावर दोघे उठून कसे नमस्कार करतात वगैरे दृश्यें हावभावासकट दाखविण्यांत आलीं. एकंदर प्रयोग लोकांना इतका आवडला की ‘Inquirer’ नांवाच्या युनिटेरियन समाजाच्या मुखपत्रांत निबंध आणि हा सर्व प्रकार प्रकाशित झाला. इतकेंच नव्हे तर त्या सर्व लेखांचें भाषांतर एका फ्रेंच वर्तमानपत्रानें प्रसिद्ध करून त्याची एक प्रत मजकडे आभारपूर्वक पाठविली.
चहापान
नवीन टर्म सुरू झाल्यावर कॉलेजांतील वृद्ध प्रोफेसर प्रत्येक विद्यार्थ्याला समक्ष भेटून, आपल्या घरीं चहा घेण्याला दर आठवड्यांतून कोणचा दिवस मुक्रर केला आहे तो कळवीत असत. सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वसतिगृहांत जागा मिळत नसे. असे विद्यार्थी गांवांत भाड्यानें जागा घेऊन राहात असत. अशा विद्यार्थ्यांच्या घरीं जाण्यासही प्रोफेसर्स कमीपणा मानीत नसत. त्यांच्या घरीं चहाची परतभेट देण्यासही आनंदानें जात. मग अशा कॉलेजाला कुटुंब म्हणू नये तर काय म्हणावेॽ
उपासक
सकाळीं १० पासून दोन प्रहरीं १ पर्यंत तीनच तास कॉलेजचीं व्याख्यानें असत, झालींच तर संध्याकाळीं जाहीर व्याख्यानें असत. रात्रींच्यावेळीं क्लबच्या सभा, संमेलनें चालत. वर्षांतून सहा महिने अभ्यास आणि सहा महिने सुट्टी, असें वर सांगितलेंच आहे. पण आठवड्यांतून चार दिवस कॉलेज व तीन दिवस सुट्ट्या असत. शनिवार, आदितवार, सोमवार हे सुटीचे दिवस ठेवण्याचें कारण हें कीं, इतर गांवांतील कुठल्याही एका युनिटेरियन समाजामध्यें जर एकादे वेळीं उपासक आचार्य नसले तर मॅंचेस्टर कॉलेजांतील विद्यार्थ्याला तें काम करण्याला पाठविण्यांत येत असे. आणि सांजसकाळच्या दोन उपासनेसाठीं जाण्यायेण्याचें भाडें, पाहुणचारासह दोन पौंड वेतन त्यांना मिळत असे. ही वर्णी मलाही लागत असे. ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून मला विशेष आवडीनें निवडण्यांत येत असे. ह्या व इतर अनेक प्रकारानें हें कॉलेज म्हणजे सर्व देशांतील सर्व युनिटेरियन समाजाचे एक कॉलेजच होऊन राहिलें होतें. याशिवाय मुलांना गरीब लोकांच्या वस्तींत जाऊन तेथें दयेचीं व परोपकाराचीं कामें करण्याची संवय लागावी म्हणून एका स्वतंत्र लहानशा मिशनची स्थापना झाली होती. ह्याचा कॉलेजाशीं प्रत्यक्ष संबंध नव्हता. तरी डॉ. ड्रॅमंड यांची कन्या मिस नेली हिनें पुढाकार घेऊन हें चालविलें होतें आणि कॉलेजचे विद्यार्थी ह्यांत भाग घेत होते.
प्रकरण १९ वें
देव्हारा
येथपर्यंत मी जें लिहिलें त्या माझ्या बालवयांतल्या चेष्टा होत्या. हा माझ्या प्राथमिक शाळेंतला १२ वर्षांच्या वयांतला काळ होता. ह्या काळांतही मी घरीं देवपूजा केव्हां केव्हां फार मी लावून करीत असें. देव्हा-यावर देव पुष्कळ असत. शिवाय इतर कोनाड्यांतूनही पूजनीय वस्तु पुष्कळ ठेविल्या असत. उदाहरणार्थ आमचा देव्हारा म्हणजे देवघरांतल्या भिंतीत माझ्या कंबरेइतक्या उंचीवर एक मोठा चार फूट रुंद व तितकाच उंच आणि ३।४ फूट खोल असा कोनाडा होता. त्यांत प्रथम देवांच्या मूर्ति आणि पितरांचे टांक नीट मांडावयाचे असत. त्यापुढें शाळिग्राम, निरनिराळ्या नद्यांतले गोटे; त्याचेहिपुढें घंटा, धूपार्ति, कापुरारती, निलांजनें, पळी, पंचपात्री आणि उजवीकडे एका अडणीवर मोठा शंख आणखी एक लहान शंख वगैरे ठेवले असत. उजवीकडे आंत पुनः एका खिडकींत श्री यल्लमाची चवरी आणि आमच्या आजीची ताळी वगैरे जवाहीर असें. डावीकडील एका लहानशा देवळींत एक समयी आणि जवळ एक काशीहून आणिलेला गंगोदक बंद करून ठेविलेला तांब्या अशा कितीतरी वस्तूंचा सुंदर संभार असे. पूजेचा उत्साह मनाला आलें कीं, ह्या सर्व देवदेवता आणि इतर वस्तु धुवून पुसून व्यवस्थेनें मांडून त्यांवर गंधाक्षता, कुंकूं, हळद, फुलें यथासांग लावून पूजा करण्यांत त्या बाळपणीं देखील मला मोठें सुख आणि ईर्षा वाटे. ती माझ्या वडील भावाला वाटत नसावी आणि हा आम्हां दोघा भावांमधील भेद बहुतकरून माझ्या बाबांच्या लक्ष्यांत आला असावा म्हणून ते मलाच पूजा करावयास सांगत असावेत. ह्यावरून माझ्या स्वभावांतील उत्साह हा गुणही दिसून येतो. विशेष सणावारीं घरीं कांहीं गोडधोड नैवेद्याचें झालें म्हणजे माझ्या बाळभक्तीला तर पूरच येत असे. मानवी जातीप्रमाणें व्यक्तींतही सकाम भक्ति अगोदर असणारच. मग मला ह्यांत लाज आणणारें कांहीं विशेष नाहीं.
आध्यात्मिकता
मूर्तिपूजा मुलांना आणि बायकांना देखील आवश्यक नाहीं असें माझें आतां धर्माचा इतिहास शास्त्रीयदृष्टीनें वाचून ठाम मत झालें आहे. तरी त्यावेळीं मूर्तिपूजेंत मला मोठी करमणूकच नव्हे तरी आपण कांहीं विशेष गोष्ट करीत आहों असें वाटे. ती गोष्ट आध्यात्मिक होती हें त्यावेळीं वाटणें शक्यच नव्हतें. तरी मला जो उत्साह आणि निरतिशय आनंद वाटत होता, तो केवळ नैवेद्याच्या लोभामुळेंच होता असेंही नव्हतें. माझ्या बाबांचा दरारा घरीं फार होता तरी माझ्या आईवर लहानपणींही मी इतका दाब टाकीत असें कीं, हट्ट धरिला असतां तर देवांच्याही अगोदर मला केलेले गोड पदार्थ खावयाला मिळाले असते. आणि बाबांनींहीं ज्याअर्थी पूजेची मजवर सक्ति कधीं केली नाहीं त्याअर्थीं पूजा करण्यांत मला तितक्या कोवळ्या वयांतही ९।१० वर्षांचा असतांना तेव्हां न सांगता येण्यासारखें कांहीं तरी आंतरिक सुख होत असावें. नाहींतर माझ्यासारख्या त्या वेळच्या काफिर आरबाला अगर तुफान पठाणाला ह्या हिंदु पूजेची दगदग सहनच झाली नसती! “व्यतिषजति पदार्थान् आंतरः कोSपि हेतुः" ह्या पूजेंत माझी कोंवळी आध्यात्मिकताच असेल, नसेल कशावरून! हा जो मी वरील तर्क रचला आहे त्याला कारण पुढें जें लिहित आहें त्यांत दिसणार आहे. तो चुकीचा ठरला तर माझी चूक कबूल करावयाला मी केव्हांही तयार आहें. कारण हें जें सारें प्रकरण मी लिहित आहें तें मी मोठा धार्मिक होतों असें भासविण्यासाठीं नसून, पुढें प्रौढपणीं माझ्यांत ज्या धार्मिक भावना स्पष्ट झाल्या त्याचेंच हें प्राथमिक अस्पष्ट रूप होतें किंवा असेल हें दाखविण्याच्या माझ्या शास्त्रीय प्रयत्न आहे.
शिवलिंग पूजा
इंग्रजी तिस-या चौथ्या यत्तेंत असतांना मी १४।१५ वर्षांचा होतों. त्यावेळीं माझ्या भावनाशील अंतःकरणांत स्पष्ट रूपानें भक्तिभावनांचा उद्रेक मला दिसून आला. ह्यावेळीं माझी मराठी वाङ्मयांत चांगली प्रगति होत होती. मी पौराणिक पोथ्या वाचीत होतों. विशेषतः मी शिवलीलामृत ह्या लहानशा पोथीचें पारायण आवडीनें करीत असें. हें मी स्नान करून जेवणापूर्वी करीत असें. शिवाय श्रावणमासांत शिवलिंगाचें अर्चन मी मोठ्या भक्तिभावानें करूं लागलों. पाटावर शिवलिंग ठेवून मी त्यावर बेलपत्राची सहस्त्रदळें वाहात असें. म्हणजे बरोबर जरी हजार पानें नसलीं तरी पुष्कळशीं पत्रीं मी स्वहस्तें तोडून आणून माझ्या आवडत्या शिवलिंगावर अर्पीत असें. आणि विष्णु सहस्त्रनामाप्रमाणें शिवनामांचा जप करीत असें.
शिव व विष्णु
हिंदु धर्मांतील शिव आणि विष्णु ह्या मुख्य दैवतांपैकीं मला पहिलेंच विशेष आवडे. अजून झालें तरी मला एकाद्या विष्णु मंदिरापेक्षां एकाद्या शिवालयांत जाऊन बसणें अधिक पसंत आहे. ह्याचें कारण विष्णु मंदिरें सापेक्षतः अधिक अर्वाचीन आणि त्यांत शिवालयापेक्षां भजनपूजनांचा व स्त्रीपुरुषांचा अधिक गोंगाट असतो. शिवालयें प्राचीन आणि निवांत असतात. गाभा-यांत मूर्तीचा सुळसुळाट आणि उपकरणांचा दणदणाट नसतो. पण हरिचिंतनात मी कृष्णाचे जे चाळे वाचीत असें त्यापेक्षां शंकर पार्वतीचे गोष्टींत अधिक साधेपण आणि भोळेपण मला त्या लहान वयांतही दिसत असे. ह्यामुळें कृष्णापेक्षां भोळा सांब अधिक आवडे!
पुराणिकाचा थाट
ह्याच दोनचार वर्षांत मी शाळेंतील माझ्या सोबत्यांस जमवून सुट्टीचे दिवसांत हरीविजयांतील गोवर्धनाख्यान, रामविजयांतील कुंभकर्णवध किंवा पांडवप्रतापांतील हरिश्चंद्राख्यान असले भक्तिरसोत्पादक अध्याय वाचून पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगत असें. विशेषतः शेवटच्या आख्यानाचे वेळीं श्रोते आणि वक्ता आम्हीं दोघेही करुणरसानें व्याकुळ होऊन रडत बसल्याचें मला आतां नीट आठवत आहे. तसेंच विठोबाच्या मठांत मागें वर्णन केलेल्या सप्ताहांत अगदीं लहानपणीं मी जो तमासगिराप्रमाणें जात होतों तो ह्यावेळीं प्रेमानें वश होऊन भाग घेऊं लागलों. पुढें बाबा गुरुचरित्र वाचून दत्तमंदिरांत जाऊं लागले तेव्हां त्या चरित्रांतील कथा मला रामरावणाच्या युद्धापेक्षां, किंबहुना कृष्णगोपींच्या लीलेपेक्षां अधिक मानवी त-हेच्या व करुण भक्तीला पोषक असलेल्या अधिक आकळू लागल्या. आणि दत्तमंदिरांतील करुणाष्टकें बाबांच्या तोंडून ऐकणें मला फार आवडत. ह्या माझ्या बुद्धिविकासाबरोबर जो धर्मभावनांचा विकास होऊं लागला त्यांतील शास्त्रीय संबंध जरी त्यावेळीं मला कळून येणें शक्य नव्हतें, तरी वस्तुस्थिति तशी होती खरी!
गोड फरक
पोथ्या वाचणें हा तिस-या प्रहरचा आणि भजनास जाणें हा एक सायंकाळचा, कांहीं अंशीं फावल्या वेळेचा, प्रकार होता. तरी श्रावण महिन्यांत स्नान करून जेवणाचे पूर्वी मी श्रीशिवलीलामृताच्या पारायणाचा, नामजपाचा, लिंगार्चनाचा आणि उपवास करून रामतीर्थास (१॥ मैल डोंगरांत) जाऊन येण्याचा जो नाद घेतला त्यांत खरा भक्तिभाव होता. आणि हा माझा नवीन नाद पाहून आईबाबांना कौतुकच नव्हे तर आश्चर्य वाटे. श्रावणमासांत डोंगरांत आपल्या वानरसेनेला घेऊन जाऊन रामेश्वराहून परत येतांना जिवंत विंचवांची माळ घरीं आणून लहान बहिणींना भेडसावणारा पठाण पो-या, आतां सरळमार्गानें उपवाशी एकाकी रामेश्वराला जाऊन त्याचा अंगारा आणून वडिलांनाही लावतो हा कोण गोड फरक! हा फरक आपल्या मुलाच्या स्वभावांत पडत आहे हें पाहून कोणा प्रेमळ आईबापाला कौतुक वाटणार नाहीं! हा जो परिपाक माझ्या स्वभावांत दिसूं लागला तो कांहीं तिस-या चौथ्या यत्तेंत एकदम आला असें नव्हे. माझ्या भावाच्या मृत्युबद्दल शोक, घरांतील दारिद्र्य, आईबाबांचा उदासीनपणा वगैरे अनेक नैसर्गिक कारणें ह्या अंतरपालटीचीं होतीं. इतकेंच नव्हे तर तिस-या, चौथ्या यत्तेंत मला माझ्या वर्गांतील हुषारीमुळें सोबत्यांमध्यें आणि वर्गामध्यें जें जें यश आणि प्रभुत्व मिळालें त्याचाही हा सात्विक परिणाम होता. इतर मुलांप्रमाणें मी यशामुळें आढ्य, हेकेखोर व जुलमी न होतां माझ्या सोबत्यांना घेऊन जरी बराच वेळ धांगडधिंगा घालीत असें तरी पुनः कांहीं वेळ पोथ्या वाचण्यांतही घालीत असें, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे, असें मला वाटत आहे. पण तेव्हां मात्र मी केवळ अनभिज्ञ आणि मुग्ध भावनाशील होतों!
भक्ति व यश
शाळेला मी नियमानें जात होतों. कारण नंबर पहिला असल्यानें वर्गाचा सेक्रेटरी मलाच व्हावें लागे. मार्कपत्रकें, हजरिपत्रकें नीट ठेवणें वगैरे शिक्षकांच्या हाताखालचीं सटर फटर कामें सेक्रेटरी नात्यानें मला करावीं लागत. म्हणून शाळेंत उशीर करून जाणें किंवा गैरहजर राहणे हें शक्यच नसे. तरी मी शाळेत जाण्यापूर्वीं आईला किंवा बाबांला न सांगतां, अथवा जातां जातां शाळेपुढच्या मारुतीचें दर्शन न घेतां कधींच जात नसें! पुढें बबलादीचे सिद्ध पुरुष २।३ वर्षें घरीं येऊं लागले, त्यांचेवरही माझी श्रद्धा बसली. तसा त्यांच्यांत मजविषयीं प्रेमळपणा होता. त्यांचा प्रसाद म्हणून बराच अंगारा मी एका पेटींत घालून ठेवीत असें. ह्यांतच रामेश्वराचा, मारुतीचा, दत्ताचा वगैरे अंगारा असे. शाळेंत जाण्यापूर्वी सर्व देवांचीच नव्हे तर बबलादीच्या सर्व सिद्ध पुरुषांचीं नांवें घेऊन आणि कपाळाला हा मिश्र अंगारा लावून मी शाळेंत जाईं. आणि मला वाटे कीं, ह्या माझ्या भक्तीमुळें मला वर्गांत रोज मार्क इतरांपेक्षां जास्त मिळून माझा नंबर नेहमीं पहिला राही. वस्तुतः हा माझा धर्मभोळेपणा होता. कारण खरा प्रकार असा कीं हा माझ्या भक्तीचा नवीन उद्रेक होण्यापूर्वीच १।२ वर्षें माझी हायस्कुलांत प्रगति होऊन माझी प्रसिद्धि झाली होती. भक्ति प्रथम असो किंवा यश प्रथम असो; ह्या दोन्हींचे कांहीं वर्षांनीं पुढें साहचर्य घडलें ही गोष्टही खोटी नाहीं.
पांचव्या यत्तेंत असतांना मला खरूज फार लागली व घरीं आम्ही सर्वचजण बेजारलों. तेव्हां श्री यल्लमाचे यात्रेला जाण्याचा मींच घरीं आग्रह धरिला आणि तो बाबांनीं पारही पाडला असें मी जर सांगितलेंच आहे, वगैरे गोष्टींवरून जरी ह्या माझ्या धर्माच्या दुस-या विकासांत कांहीं अंशीं सकामपणाची झांक मारतें; तरी एकंदरींत त्यावेळच्या माझ्या भक्तिभावनांतून ब-याच अंशानें सहजमधुरता होती असें मला वाटतें. येरवीं, माझे सोबती जे अभ्यासांत, खेळांत आणि इतर करमणुकींत माझ्या प्रभावळींत गुरफटले ते माझ्या धार्मिक छंदांतही तसेच गुरफटले नसते.
अधिक स्फोट
हा जो मजमध्यें भक्तीचा उद्रेक झाला म्हणून मीं वर म्हटलें तो जसा एकादा भूकंप अकस्मात व्हावा तशा प्रकारें मी हायस्कूलमध्यें असतांना झाला असें मुळींच नव्हे. हायस्कूलमध्यें गेल्यावर मी नव्या जगांत गेल्यासारखें मला कां वाटूं लागलें, घरची स्थिति बदलल्यामुळेंही माझ्या स्वभावांत फरक कसा झाला वगैरे वेळोवेळीं माझ्या स्वभावविकासाची मीमांसा शास्त्रीयदृष्ट्या वर केली आहे. धर्मभावनेविषयीं माझी स्वतःच्या शास्त्रीय दृष्टीचें थोडे दिग्दर्शन मीं केलें आहे. त्यावरून धार्मिक भावना ह्या इतर भावनाहून अगदीं तत्वतः भिन्न आहेत असें कित्येक विचारी माणसें समजत आहेत तसें मी समजत नाहीं. माझी पुढची कहाणी ऐकून वाचक गोंधळू नयेत म्हणून ह्याचा थोडासा जास्त स्फोट करणें मला येथें जरूर दिसतें.
बालस्तावत् क्रीडा सक्तस्तरुणस्तावत्
तरुणी-रक्तः
वृद्धस्तावत् चिंतामग्नः परेब्रह्मणि
कोपि न लग्नः
असें प्रत्यक्ष आद्य शंकराचार्य म्हणतात. पण मला तर वाटतें कीं, लहानपणीं मुलांची खेळाची आवड, तरुणपणीं तरुणीसंबंधीं उदात्त रस आणि म्हातारपणीं एकाद्या ऐहिक बाबतींतील सात्विक चिंतामग्नता; ह्या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्वतः अगदीं भिन्नच आहे असें म्हणता येत नाहीं. ह्या भावनांत जी वयपरत्वें अंतःकरण्याची परिणति होत जाते तीच किंचित् आणखी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली कीं तिला आम्ही भक्ति हें नांव देतों. ज्या सहज आनंदानें मूल खेळतें, तरुण रमतों, आणि वृद्ध सात्विक चिंतेनें व्याकुळ होतो; तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तींत आहे, हें माझें मत कित्येकांना विपरीत वाटेल. ऐहिक रस आणि पारमार्थिक रस ह्या दोन्हींला एकाच माळेंत गोंवतों ही माझी अक्षम्य भूल वाटणें साहजिक आहे. परंतु ऐहिक काय कीं पारमार्थिक काय रस तो रसच; तो कांहीं अरस होणार नाहीं. ह्याच दृष्टीनें वेदान्तानेंही ईश्वराची ‘रसोहि सः’ अशी व्याख्या केली आहे. आणि सत्, चित् आणि शेवटचें आनंद हे त्याचें स्वरूप सांगितलें आहे. मग मी भक्तिभावनेची इतर स्वाभाविक भावनांमध्येंच गणना करितों ह्यांत काय पाप घडतेंॽ ह्या न्यायानें पाहतां बाळपणींचा मी खेळकर, पोरपणींचा मी खोडकर किंबहुना कादंब-या वाचून अकालींच श्रृंगार रसाच्या वेदनांनीं विव्हळ होणारा, पुढें पोक्तपणीं अनेक राजसी भावनांचे हेलकावे खाऊन, शेवटीं वृद्धपणीं महारापोरांच्या घरच्या चिंतेत असो किंवा स्वतः माझ्या घरच्या मुलाबाळांच्या चिंतेंत असो, प्रसंगोपात्त मग्न झालों असलों तरी ह्या सर्व निरनिराळ्या भावनांत आणि माझ्या धार्मिक आयुष्यांतील उत्तमोत्तम भक्तिभावनेंत तत्वतः भिन्नता माझ्या तरी अनुभवास आली नाहीं. मी मोठा झाल्यावर प्रार्थना समाजांत असतांना आवड, प्रेम आणि भक्ति ह्या विषयावर एका कौटुंबिक उपासनेच्या प्रसंगीं प्रवचन करीत असतांना जे विचार प्रकट केले आहेत ते विचार आतां मी येथें भक्तिभावनेविषयीं जी मीमांसा करीत आहें तिच्या उलट आहेत हें खरें. पण हल्लींची माझी दृष्टि आधुनिक शास्त्रांतील विकास वादाला अधिक सुसंगत आहे असें वाटतें. ह्यामुळें हायस्कूलमधलाच काय पण पुढचाही माझ्या धर्मभावनांचा सर्व विकास माझ्या आयुष्यांतील इतर सर्व अनुभवांशीं आणि तदनुसार घडलेल्या वागणुकीशीं तत्वतः मुळींच विसंगत नाहीं असें माझें आतां मत झालें आहे. असो!
साधुसमागम
पोरवयांतल्या सहजभक्तीच्या आठवणी सांगतांना मी माझ्या पूजाअर्चाच्या, पोथीवाचनाच्या, नामजपाच्या, भजनांच्या व यात्रादिकांच्या वगैरे आठवणी वर सांगितल्या. पण आणखी एक मुख्य विषयाच्या आठवणी सांगणें जरूर आहे. ती गोष्ट संतसमागम ही होय. आतां ह्या पोरवयांत मला खरे संत व खोटे संत ह्यांत फरक तो काय कळणार! मी करीत होतों त्या भक्तीचा विषय जरी मूर्तिच होत्या आणि ती भावना जरी पोरकट होती तरी त्या सर्व भावना त्यावेळच्या मानानें अगदीं शुद्ध, निष्कपट आणि जोरदार होत्या एवढीच गोष्ट मुद्याची आहे. त्याचप्रमाणें ज्या ज्या कांहीं पुरुषांच्या समागमामुळें मला ह्या वयांत धार्मिक आनंद होत असे, त्या त्या पुरुषांचा खरा साधुपणा किंवा विज्ञान कोणत्या दर्जाचा होता हा मुद्दा गौण आहे. माझी श्रद्धा व प्रेम त्या त्या माणसावर बसत असे हाच मुद्दा मुख्य आहे. ह्याच दृष्टीनें पुढच्या आठवणींचें महत्व आहे. एरवीं त्यांत कांहीं विशेष अर्थ नाहीं. बाबांना देवळांचा व भजनांचा जरूर नाद होता, तसाच भटकणा-या साधु बैराग्यांचा आणि सिद्ध महंताचाही नाद होता, असें मी मागें त्यांच्या आठवणी देतांना सांगितलें आहे. त्यांनीं नादावून घरीं आणिलेल्या असल्या माणसांवरच साधू समजून माझीही श्रद्धा बसत असे. एरवीं अशा वयांत माझा इतर कोठल्या साधूंशीं परिचय घडणें शक्य असणार बरेंॽ
जटाधारी गोसावी
अघोरी पंथांतल्या एका जटाधारी गोसाव्याकडे बाबा एका काळीं फार जात येत असत. ह्यावेळीं मी हायस्कुलांत जात होतो कीं त्यापूर्वींचा हा काळ होता हें मला नीट स्मरत नाहीं. हा एका ठिकाणीं गुप्त होऊन दुसरीकडे प्रगट होतों, अशी कांहीं भाविक लोकांची समजूत झाली असावी. साधारणपणें हा बुवा गांवाबाहेर कोठल्यातरी झाडाखालीं धुणी पेटवून रात्रंदिवस अंगाला राख लावून बसलेला असे. तो बसल्या जागेचा कधीं उठतच नसे अशीही लोकांची समजूत असे. ह्याची मुद्रा प्रसन्न व बोलणें हेंगाडें मराठीच कां असे ना, पण प्रेमळ असे. हा एकाएकी एके दिवशीं दोन प्रहरीं आमच्या गोठ्यांतल्या एका अंधारी कोप-यांत उभा असलेला आम्हांला दिसला. बाबा जरी विश्वासू आणि आदरशील होते, तरी भलत्या सलत्या चमत्कारावर भुलून जाण्याइतकी त्यांची श्रद्धा आंधळी नव्हती. म्हणून त्या बोवाचें हें चमत्कारिक येणें बाबांना आवडलें नाहीं. त्यांनीं त्याला आपल्या ठिकाणीं पोचविलें. तरी पण विशेष न रागावतां त्या बुवाला रोज दोनप्रहरीं एक भाकरी व थोडी भाजी पाठविण्यास बाबांनीं आईस सांगितलें. हें अन्न रोज नेऊन पोचविण्याचें काम मजकडे होतें आणि तें मी आनंदानें करीत असें. ह्यांत मला आनंद तो कां वाटावा बरेंॽ लहान मुलाला असलीं कामें नियमानें करण्याची हौस असणें साहजिक मुळींच नाहीं. मला तर त्या साधुकडे जाऊन त्याचा समाचार घेणें, तो भुकेलेला गोसावी तें अऩ्न आतुरतेनें घेई म्हणून विशेषतः कळकळीनें तें पोचविणें; अन्न ज्या ताटांतून नेत असें त्यांत तो साधू चार दाळींबाचे दाणे, खोब-याचा लहानसा तुकडा, किंवा थोडीशी खडीसाखर प्रसाद म्हणून कांहीं तरी आपल्याजवळचें घालून ताट परत करीत असे - तो प्रसाद मी श्रद्धेनें घरीं भावंडांना आणून वाटणें वगैरें गोष्टी त्या लहान वयांत भक्तीच्याच द्योतक होत्या! केवळ भुकेलेल्यास अन्न देण्याची परोपकारी भावना किंवा साधुसमागमाची जाणूनबूजून आवड राखण्याची आध्यात्मिक भावनेला माझें तें लहान वय पात्र नव्हतें. पण ह्या दोन्हींच्या मधली एक स्थिति मी तेव्हां अनुभवीत होतों हें खरें. तिला काय नांव द्यावें हें मला आतां देखील नीट समजत नाहीं!
इतर बैरागी
मराठा जातींत कोणी तरी गोसावी गुरु करून घेण्याची परंपरा चालत आली आहे. नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेश्वर येथील विठ्ठलपुरी नांवाचे गोसावी माझे वडिलांचे गुरु होते. ते वृद्ध होते. त्यांचे शिष्य गोसावी ह्यांचा उपदेश मला आणि माझ्या भावाला बाबांनीं कान फुंकण्याचा विधि करून देवविला होता. हे गोसावी एक दोन वर्षांनीं आमचे घरीं फिरतीवर येऊन संभावना घेऊन जात. त्यावेळीं त्यांच्याशीं माझा लळा विशेष असे. तुळजापुरचे भोपे भवानराव कदम आमचे घरीं कुळदेवतेचा नवस वगैरे काय असेल तें घेऊन जाण्यास मधून मधून येत. तेही मला फार आवडत. पुढें इंग्रजी शाळेंत असतांना नाशिकाकडचे भगवानदास आणि माधवदास नांवाचे दोन वैष्णव बैरागी आमचेकडे वरचेवर येत असत. हे नुसते पांथस्थ या नात्यानें जमखंडीच्या कोठल्यातरी देवळांत उतरून बाजारांत भिक्षा मागून एक वेळ जेवून राहात. आमच्याकडून त्यांना कसलीही आकांक्षा नसे. तरी त्यांचा व आमच्या घरचा फार लोभ जडला होता. त्याचें विशेष कारण मी इंग्रजी शाळेंत जाणारा, मोठा समजूतदार, प्रेमळ मुलगा हें ओळखून, बाबा असोत नसोत, माझ्या भेटीला घरीं येऊन माझ्याशीं त्यांनी परिचय वाढविला होता. शेवटीं इंग्रजी ६ व्या ७ व्या इयत्तेंत असतांना बबलादीचे सिद्धांचें येणें जाणें फार झालें. त्यांचा माझेवरच नव्हे तर अखेरीस माझाही त्यांचेवर काय परस्पर परिणाम झाले हें मागें सांगितलेंच आहे.
योग्य पारख
देवपूजा, भजन, पोथीवाचन आणि साधूंची आवड वगैरे जे धार्मिक भावनांचे प्रकार आठवतील तसे जे मी वर सांगितले त्यावरून व आमच्या घराण्यांतील आजी आणि आई ह्यांचीं व्रतें आणि उपास ह्याविषयीं जी मीं हकिकत दिली तिच्यावरून आमच्या घराण्यांत हिंदु धर्माची जुनी परंपरा, आचारविचार आणि बाळबोधपणा कसा रुजला होता हें दिसून येतें. पण ह्यापेक्षां विशेष गोष्ट सांगावयाची ती ही कीं, जुन्या धर्माचे इतके तपशिलवार आचार आमचे घरीं चालत होते तरी केवळ कर्मठपणा, धर्मभोळेपणा, दंभ आणि दुराग्रहाचा पगडा आमच्या घरीं आईबाबांच्या वर्तनांत मला केव्हांच दिसून आला नाहीं. एकाद्या ढोंगी साधूचें कपट दिसून आलें किंवा कोणाही सांप्रदायिक अतिथीचा स्वार्थी मतलब दिसून आला कीं बाबांचा निस्पृहपणा उग्रस्वरूप धारण करीत असे. आल्या अतिथीची आमचे घरीं जरी शक्तिनुसार संभावना होण्याला कधीं चुकत नसे, तरी त्यानें एकादें दुर्वर्तन केलें किंवा त्याचा लोभी आणि मतलबी डाव दिसला तर लागलीच त्याची उलट दिशेनें संभावना करावयाला बाबा कधीं मागें घेत नसत! ह्यामुळें भलत्यासलत्या सालोमालो भटक्याला आमचे दारांत पाय ठेवण्यापूर्वीं विचार करावा लागत असे. आईच्या भक्तींत कोणताही वरपंग नव्हता. ह्या माझ्या वडिलांच्या स्वभावांतच माझ्या भावी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचीं बीजें पूर्णपणें आढळत आहेत. आईनें व्रतें जरी बरीच केलीं तरी अमक्या वेळीं अमका नवस केलाच पाहिजे, अमक्याला अमके दान दिलेंच पाहिजे असा हट्ट कधींच केला नाहीं. दोघांच्याही धर्मभावना साध्या, सहज आणि निर्हेतुक होत्या. आणि त्यांतच माझ्या ‘भावी’ धर्माचाच नव्हे तर माझ्या सर्व सामाजिक सुधारणांचाही उगम आहे.
प्रकरण १९ वें
देव्हारा
येथपर्यंत मी जें लिहिलें त्या माझ्या बालवयांतल्या चेष्टा होत्या. हा माझ्या प्राथमिक शाळेंतला १२ वर्षांच्या वयांतला काळ होता. ह्या काळांतही मी घरीं देवपूजा केव्हां केव्हां फार मी लावून करीत असें. देव्हा-यावर देव पुष्कळ असत. शिवाय इतर कोनाड्यांतूनही पूजनीय वस्तु पुष्कळ ठेविल्या असत. उदाहरणार्थ आमचा देव्हारा म्हणजे देवघरांतल्या भिंतीत माझ्या कंबरेइतक्या उंचीवर एक मोठा चार फूट रुंद व तितकाच उंच आणि ३।४ फूट खोल असा कोनाडा होता. त्यांत प्रथम देवांच्या मूर्ति आणि पितरांचे टांक नीट मांडावयाचे असत. त्यापुढें शाळिग्राम, निरनिराळ्या नद्यांतले गोटे; त्याचेहिपुढें घंटा, धूपार्ति, कापुरारती, निलांजनें, पळी, पंचपात्री आणि उजवीकडे एका अडणीवर मोठा शंख आणखी एक लहान शंख वगैरे ठेवले असत. उजवीकडे आंत पुनः एका खिडकींत श्री यल्लमाची चवरी आणि आमच्या आजीची ताळी वगैरे जवाहीर असें. डावीकडील एका लहानशा देवळींत एक समयी आणि जवळ एक काशीहून आणिलेला गंगोदक बंद करून ठेविलेला तांब्या अशा कितीतरी वस्तूंचा सुंदर संभार असे. पूजेचा उत्साह मनाला आलें कीं, ह्या सर्व देवदेवता आणि इतर वस्तु धुवून पुसून व्यवस्थेनें मांडून त्यांवर गंधाक्षता, कुंकूं, हळद, फुलें यथासांग लावून पूजा करण्यांत त्या बाळपणीं देखील मला मोठें सुख आणि ईर्षा वाटे. ती माझ्या वडील भावाला वाटत नसावी आणि हा आम्हां दोघा भावांमधील भेद बहुतकरून माझ्या बाबांच्या लक्ष्यांत आला असावा म्हणून ते मलाच पूजा करावयास सांगत असावेत. ह्यावरून माझ्या स्वभावांतील उत्साह हा गुणही दिसून येतो. विशेष सणावारीं घरीं कांहीं गोडधोड नैवेद्याचें झालें म्हणजे माझ्या बाळभक्तीला तर पूरच येत असे. मानवी जातीप्रमाणें व्यक्तींतही सकाम भक्ति अगोदर असणारच. मग मला ह्यांत लाज आणणारें कांहीं विशेष नाहीं.
आध्यात्मिकता
मूर्तिपूजा मुलांना आणि बायकांना देखील आवश्यक नाहीं असें माझें आतां धर्माचा इतिहास शास्त्रीयदृष्टीनें वाचून ठाम मत झालें आहे. तरी त्यावेळीं मूर्तिपूजेंत मला मोठी करमणूकच नव्हे तरी आपण कांहीं विशेष गोष्ट करीत आहों असें वाटे. ती गोष्ट आध्यात्मिक होती हें त्यावेळीं वाटणें शक्यच नव्हतें. तरी मला जो उत्साह आणि निरतिशय आनंद वाटत होता, तो केवळ नैवेद्याच्या लोभामुळेंच होता असेंही नव्हतें. माझ्या बाबांचा दरारा घरीं फार होता तरी माझ्या आईवर लहानपणींही मी इतका दाब टाकीत असें कीं, हट्ट धरिला असतां तर देवांच्याही अगोदर मला केलेले गोड पदार्थ खावयाला मिळाले असते. आणि बाबांनींहीं ज्याअर्थी पूजेची मजवर सक्ति कधीं केली नाहीं त्याअर्थीं पूजा करण्यांत मला तितक्या कोवळ्या वयांतही ९।१० वर्षांचा असतांना तेव्हां न सांगता येण्यासारखें कांहीं तरी आंतरिक सुख होत असावें. नाहींतर माझ्यासारख्या त्या वेळच्या काफिर आरबाला अगर तुफान पठाणाला ह्या हिंदु पूजेची दगदग सहनच झाली नसती! “व्यतिषजति पदार्थान् आंतरः कोSपि हेतुः" ह्या पूजेंत माझी कोंवळी आध्यात्मिकताच असेल, नसेल कशावरून! हा जो मी वरील तर्क रचला आहे त्याला कारण पुढें जें लिहित आहें त्यांत दिसणार आहे. तो चुकीचा ठरला तर माझी चूक कबूल करावयाला मी केव्हांही तयार आहें. कारण हें जें सारें प्रकरण मी लिहित आहें तें मी मोठा धार्मिक होतों असें भासविण्यासाठीं नसून, पुढें प्रौढपणीं माझ्यांत ज्या धार्मिक भावना स्पष्ट झाल्या त्याचेंच हें प्राथमिक अस्पष्ट रूप होतें किंवा असेल हें दाखविण्याच्या माझ्या शास्त्रीय प्रयत्न आहे.
शिवलिंग पूजा
इंग्रजी तिस-या चौथ्या यत्तेंत असतांना मी १४।१५ वर्षांचा होतों. त्यावेळीं माझ्या भावनाशील अंतःकरणांत स्पष्ट रूपानें भक्तिभावनांचा उद्रेक मला दिसून आला. ह्यावेळीं माझी मराठी वाङ्मयांत चांगली प्रगति होत होती. मी पौराणिक पोथ्या वाचीत होतों. विशेषतः मी शिवलीलामृत ह्या लहानशा पोथीचें पारायण आवडीनें करीत असें. हें मी स्नान करून जेवणापूर्वी करीत असें. शिवाय श्रावणमासांत शिवलिंगाचें अर्चन मी मोठ्या भक्तिभावानें करूं लागलों. पाटावर शिवलिंग ठेवून मी त्यावर बेलपत्राची सहस्त्रदळें वाहात असें. म्हणजे बरोबर जरी हजार पानें नसलीं तरी पुष्कळशीं पत्रीं मी स्वहस्तें तोडून आणून माझ्या आवडत्या शिवलिंगावर अर्पीत असें. आणि विष्णु सहस्त्रनामाप्रमाणें शिवनामांचा जप करीत असें.
शिव व विष्णु
हिंदु धर्मांतील शिव आणि विष्णु ह्या मुख्य दैवतांपैकीं मला पहिलेंच विशेष आवडे. अजून झालें तरी मला एकाद्या विष्णु मंदिरापेक्षां एकाद्या शिवालयांत जाऊन बसणें अधिक पसंत आहे. ह्याचें कारण विष्णु मंदिरें सापेक्षतः अधिक अर्वाचीन आणि त्यांत शिवालयापेक्षां भजनपूजनांचा व स्त्रीपुरुषांचा अधिक गोंगाट असतो. शिवालयें प्राचीन आणि निवांत असतात. गाभा-यांत मूर्तीचा सुळसुळाट आणि उपकरणांचा दणदणाट नसतो. पण हरिचिंतनात मी कृष्णाचे जे चाळे वाचीत असें त्यापेक्षां शंकर पार्वतीचे गोष्टींत अधिक साधेपण आणि भोळेपण मला त्या लहान वयांतही दिसत असे. ह्यामुळें कृष्णापेक्षां भोळा सांब अधिक आवडे!
पुराणिकाचा थाट
ह्याच दोनचार वर्षांत मी शाळेंतील माझ्या सोबत्यांस जमवून सुट्टीचे दिवसांत हरीविजयांतील गोवर्धनाख्यान, रामविजयांतील कुंभकर्णवध किंवा पांडवप्रतापांतील हरिश्चंद्राख्यान असले भक्तिरसोत्पादक अध्याय वाचून पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगत असें. विशेषतः शेवटच्या आख्यानाचे वेळीं श्रोते आणि वक्ता आम्हीं दोघेही करुणरसानें व्याकुळ होऊन रडत बसल्याचें मला आतां नीट आठवत आहे. तसेंच विठोबाच्या मठांत मागें वर्णन केलेल्या सप्ताहांत अगदीं लहानपणीं मी जो तमासगिराप्रमाणें जात होतों तो ह्यावेळीं प्रेमानें वश होऊन भाग घेऊं लागलों. पुढें बाबा गुरुचरित्र वाचून दत्तमंदिरांत जाऊं लागले तेव्हां त्या चरित्रांतील कथा मला रामरावणाच्या युद्धापेक्षां, किंबहुना कृष्णगोपींच्या लीलेपेक्षां अधिक मानवी त-हेच्या व करुण भक्तीला पोषक असलेल्या अधिक आकळू लागल्या. आणि दत्तमंदिरांतील करुणाष्टकें बाबांच्या तोंडून ऐकणें मला फार आवडत. ह्या माझ्या बुद्धिविकासाबरोबर जो धर्मभावनांचा विकास होऊं लागला त्यांतील शास्त्रीय संबंध जरी त्यावेळीं मला कळून येणें शक्य नव्हतें, तरी वस्तुस्थिति तशी होती खरी!
गोड फरक
पोथ्या वाचणें हा तिस-या प्रहरचा आणि भजनास जाणें हा एक सायंकाळचा, कांहीं अंशीं फावल्या वेळेचा, प्रकार होता. तरी श्रावण महिन्यांत स्नान करून जेवणाचे पूर्वी मी श्रीशिवलीलामृताच्या पारायणाचा, नामजपाचा, लिंगार्चनाचा आणि उपवास करून रामतीर्थास (१॥ मैल डोंगरांत) जाऊन येण्याचा जो नाद घेतला त्यांत खरा भक्तिभाव होता. आणि हा माझा नवीन नाद पाहून आईबाबांना कौतुकच नव्हे तर आश्चर्य वाटे. श्रावणमासांत डोंगरांत आपल्या वानरसेनेला घेऊन जाऊन रामेश्वराहून परत येतांना जिवंत विंचवांची माळ घरीं आणून लहान बहिणींना भेडसावणारा पठाण पो-या, आतां सरळमार्गानें उपवाशी एकाकी रामेश्वराला जाऊन त्याचा अंगारा आणून वडिलांनाही लावतो हा कोण गोड फरक! हा फरक आपल्या मुलाच्या स्वभावांत पडत आहे हें पाहून कोणा प्रेमळ आईबापाला कौतुक वाटणार नाहीं! हा जो परिपाक माझ्या स्वभावांत दिसूं लागला तो कांहीं तिस-या चौथ्या यत्तेंत एकदम आला असें नव्हे. माझ्या भावाच्या मृत्युबद्दल शोक, घरांतील दारिद्र्य, आईबाबांचा उदासीनपणा वगैरे अनेक नैसर्गिक कारणें ह्या अंतरपालटीचीं होतीं. इतकेंच नव्हे तर तिस-या, चौथ्या यत्तेंत मला माझ्या वर्गांतील हुषारीमुळें सोबत्यांमध्यें आणि वर्गामध्यें जें जें यश आणि प्रभुत्व मिळालें त्याचाही हा सात्विक परिणाम होता. इतर मुलांप्रमाणें मी यशामुळें आढ्य, हेकेखोर व जुलमी न होतां माझ्या सोबत्यांना घेऊन जरी बराच वेळ धांगडधिंगा घालीत असें तरी पुनः कांहीं वेळ पोथ्या वाचण्यांतही घालीत असें, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे, असें मला वाटत आहे. पण तेव्हां मात्र मी केवळ अनभिज्ञ आणि मुग्ध भावनाशील होतों!
भक्ति व यश
शाळेला मी नियमानें जात होतों. कारण नंबर पहिला असल्यानें वर्गाचा सेक्रेटरी मलाच व्हावें लागे. मार्कपत्रकें, हजरिपत्रकें नीट ठेवणें वगैरे शिक्षकांच्या हाताखालचीं सटर फटर कामें सेक्रेटरी नात्यानें मला करावीं लागत. म्हणून शाळेंत उशीर करून जाणें किंवा गैरहजर राहणे हें शक्यच नसे. तरी मी शाळेत जाण्यापूर्वीं आईला किंवा बाबांला न सांगतां, अथवा जातां जातां शाळेपुढच्या मारुतीचें दर्शन न घेतां कधींच जात नसें! पुढें बबलादीचे सिद्ध पुरुष २।३ वर्षें घरीं येऊं लागले, त्यांचेवरही माझी श्रद्धा बसली. तसा त्यांच्यांत मजविषयीं प्रेमळपणा होता. त्यांचा प्रसाद म्हणून बराच अंगारा मी एका पेटींत घालून ठेवीत असें. ह्यांतच रामेश्वराचा, मारुतीचा, दत्ताचा वगैरे अंगारा असे. शाळेंत जाण्यापूर्वी सर्व देवांचीच नव्हे तर बबलादीच्या सर्व सिद्ध पुरुषांचीं नांवें घेऊन आणि कपाळाला हा मिश्र अंगारा लावून मी शाळेंत जाईं. आणि मला वाटे कीं, ह्या माझ्या भक्तीमुळें मला वर्गांत रोज मार्क इतरांपेक्षां जास्त मिळून माझा नंबर नेहमीं पहिला राही. वस्तुतः हा माझा धर्मभोळेपणा होता. कारण खरा प्रकार असा कीं हा माझ्या भक्तीचा नवीन उद्रेक होण्यापूर्वीच १।२ वर्षें माझी हायस्कुलांत प्रगति होऊन माझी प्रसिद्धि झाली होती. भक्ति प्रथम असो किंवा यश प्रथम असो; ह्या दोन्हींचे कांहीं वर्षांनीं पुढें साहचर्य घडलें ही गोष्टही खोटी नाहीं.
पांचव्या यत्तेंत असतांना मला खरूज फार लागली व घरीं आम्ही सर्वचजण बेजारलों. तेव्हां श्री यल्लमाचे यात्रेला जाण्याचा मींच घरीं आग्रह धरिला आणि तो बाबांनीं पारही पाडला असें मी जर सांगितलेंच आहे, वगैरे गोष्टींवरून जरी ह्या माझ्या धर्माच्या दुस-या विकासांत कांहीं अंशीं सकामपणाची झांक मारतें; तरी एकंदरींत त्यावेळच्या माझ्या भक्तिभावनांतून ब-याच अंशानें सहजमधुरता होती असें मला वाटतें. येरवीं, माझे सोबती जे अभ्यासांत, खेळांत आणि इतर करमणुकींत माझ्या प्रभावळींत गुरफटले ते माझ्या धार्मिक छंदांतही तसेच गुरफटले नसते.
अधिक स्फोट
हा जो मजमध्यें भक्तीचा उद्रेक झाला म्हणून मीं वर म्हटलें तो जसा एकादा भूकंप अकस्मात व्हावा तशा प्रकारें मी हायस्कूलमध्यें असतांना झाला असें मुळींच नव्हे. हायस्कूलमध्यें गेल्यावर मी नव्या जगांत गेल्यासारखें मला कां वाटूं लागलें, घरची स्थिति बदलल्यामुळेंही माझ्या स्वभावांत फरक कसा झाला वगैरे वेळोवेळीं माझ्या स्वभावविकासाची मीमांसा शास्त्रीयदृष्ट्या वर केली आहे. धर्मभावनेविषयीं माझी स्वतःच्या शास्त्रीय दृष्टीचें थोडे दिग्दर्शन मीं केलें आहे. त्यावरून धार्मिक भावना ह्या इतर भावनाहून अगदीं तत्वतः भिन्न आहेत असें कित्येक विचारी माणसें समजत आहेत तसें मी समजत नाहीं. माझी पुढची कहाणी ऐकून वाचक गोंधळू नयेत म्हणून ह्याचा थोडासा जास्त स्फोट करणें मला येथें जरूर दिसतें.
बालस्तावत् क्रीडा सक्तस्तरुणस्तावत्
तरुणी-रक्तः
वृद्धस्तावत् चिंतामग्नः परेब्रह्मणि
कोपि न लग्नः
असें प्रत्यक्ष आद्य शंकराचार्य म्हणतात. पण मला तर वाटतें कीं, लहानपणीं मुलांची खेळाची आवड, तरुणपणीं तरुणीसंबंधीं उदात्त रस आणि म्हातारपणीं एकाद्या ऐहिक बाबतींतील सात्विक चिंतामग्नता; ह्या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्वतः अगदीं भिन्नच आहे असें म्हणता येत नाहीं. ह्या भावनांत जी वयपरत्वें अंतःकरण्याची परिणति होत जाते तीच किंचित् आणखी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली कीं तिला आम्ही भक्ति हें नांव देतों. ज्या सहज आनंदानें मूल खेळतें, तरुण रमतों, आणि वृद्ध सात्विक चिंतेनें व्याकुळ होतो; तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तींत आहे, हें माझें मत कित्येकांना विपरीत वाटेल. ऐहिक रस आणि पारमार्थिक रस ह्या दोन्हींला एकाच माळेंत गोंवतों ही माझी अक्षम्य भूल वाटणें साहजिक आहे. परंतु ऐहिक काय कीं पारमार्थिक काय रस तो रसच; तो कांहीं अरस होणार नाहीं. ह्याच दृष्टीनें वेदान्तानेंही ईश्वराची ‘रसोहि सः’ अशी व्याख्या केली आहे. आणि सत्, चित् आणि शेवटचें आनंद हे त्याचें स्वरूप सांगितलें आहे. मग मी भक्तिभावनेची इतर स्वाभाविक भावनांमध्येंच गणना करितों ह्यांत काय पाप घडतेंॽ ह्या न्यायानें पाहतां बाळपणींचा मी खेळकर, पोरपणींचा मी खोडकर किंबहुना कादंब-या वाचून अकालींच श्रृंगार रसाच्या वेदनांनीं विव्हळ होणारा, पुढें पोक्तपणीं अनेक राजसी भावनांचे हेलकावे खाऊन, शेवटीं वृद्धपणीं महारापोरांच्या घरच्या चिंतेत असो किंवा स्वतः माझ्या घरच्या मुलाबाळांच्या चिंतेंत असो, प्रसंगोपात्त मग्न झालों असलों तरी ह्या सर्व निरनिराळ्या भावनांत आणि माझ्या धार्मिक आयुष्यांतील उत्तमोत्तम भक्तिभावनेंत तत्वतः भिन्नता माझ्या तरी अनुभवास आली नाहीं. मी मोठा झाल्यावर प्रार्थना समाजांत असतांना आवड, प्रेम आणि भक्ति ह्या विषयावर एका कौटुंबिक उपासनेच्या प्रसंगीं प्रवचन करीत असतांना जे विचार प्रकट केले आहेत ते विचार आतां मी येथें भक्तिभावनेविषयीं जी मीमांसा करीत आहें तिच्या उलट आहेत हें खरें. पण हल्लींची माझी दृष्टि आधुनिक शास्त्रांतील विकास वादाला अधिक सुसंगत आहे असें वाटतें. ह्यामुळें हायस्कूलमधलाच काय पण पुढचाही माझ्या धर्मभावनांचा सर्व विकास माझ्या आयुष्यांतील इतर सर्व अनुभवांशीं आणि तदनुसार घडलेल्या वागणुकीशीं तत्वतः मुळींच विसंगत नाहीं असें माझें आतां मत झालें आहे. असो!
साधुसमागम
पोरवयांतल्या सहजभक्तीच्या आठवणी सांगतांना मी माझ्या पूजाअर्चाच्या, पोथीवाचनाच्या, नामजपाच्या, भजनांच्या व यात्रादिकांच्या वगैरे आठवणी वर सांगितल्या. पण आणखी एक मुख्य विषयाच्या आठवणी सांगणें जरूर आहे. ती गोष्ट संतसमागम ही होय. आतां ह्या पोरवयांत मला खरे संत व खोटे संत ह्यांत फरक तो काय कळणार! मी करीत होतों त्या भक्तीचा विषय जरी मूर्तिच होत्या आणि ती भावना जरी पोरकट होती तरी त्या सर्व भावना त्यावेळच्या मानानें अगदीं शुद्ध, निष्कपट आणि जोरदार होत्या एवढीच गोष्ट मुद्याची आहे. त्याचप्रमाणें ज्या ज्या कांहीं पुरुषांच्या समागमामुळें मला ह्या वयांत धार्मिक आनंद होत असे, त्या त्या पुरुषांचा खरा साधुपणा किंवा विज्ञान कोणत्या दर्जाचा होता हा मुद्दा गौण आहे. माझी श्रद्धा व प्रेम त्या त्या माणसावर बसत असे हाच मुद्दा मुख्य आहे. ह्याच दृष्टीनें पुढच्या आठवणींचें महत्व आहे. एरवीं त्यांत कांहीं विशेष अर्थ नाहीं. बाबांना देवळांचा व भजनांचा जरूर नाद होता, तसाच भटकणा-या साधु बैराग्यांचा आणि सिद्ध महंताचाही नाद होता, असें मी मागें त्यांच्या आठवणी देतांना सांगितलें आहे. त्यांनीं नादावून घरीं आणिलेल्या असल्या माणसांवरच साधू समजून माझीही श्रद्धा बसत असे. एरवीं अशा वयांत माझा इतर कोठल्या साधूंशीं परिचय घडणें शक्य असणार बरेंॽ
जटाधारी गोसावी
अघोरी पंथांतल्या एका जटाधारी गोसाव्याकडे बाबा एका काळीं फार जात येत असत. ह्यावेळीं मी हायस्कुलांत जात होतो कीं त्यापूर्वींचा हा काळ होता हें मला नीट स्मरत नाहीं. हा एका ठिकाणीं गुप्त होऊन दुसरीकडे प्रगट होतों, अशी कांहीं भाविक लोकांची समजूत झाली असावी. साधारणपणें हा बुवा गांवाबाहेर कोठल्यातरी झाडाखालीं धुणी पेटवून रात्रंदिवस अंगाला राख लावून बसलेला असे. तो बसल्या जागेचा कधीं उठतच नसे अशीही लोकांची समजूत असे. ह्याची मुद्रा प्रसन्न व बोलणें हेंगाडें मराठीच कां असे ना, पण प्रेमळ असे. हा एकाएकी एके दिवशीं दोन प्रहरीं आमच्या गोठ्यांतल्या एका अंधारी कोप-यांत उभा असलेला आम्हांला दिसला. बाबा जरी विश्वासू आणि आदरशील होते, तरी भलत्या सलत्या चमत्कारावर भुलून जाण्याइतकी त्यांची श्रद्धा आंधळी नव्हती. म्हणून त्या बोवाचें हें चमत्कारिक येणें बाबांना आवडलें नाहीं. त्यांनीं त्याला आपल्या ठिकाणीं पोचविलें. तरी पण विशेष न रागावतां त्या बुवाला रोज दोनप्रहरीं एक भाकरी व थोडी भाजी पाठविण्यास बाबांनीं आईस सांगितलें. हें अन्न रोज नेऊन पोचविण्याचें काम मजकडे होतें आणि तें मी आनंदानें करीत असें. ह्यांत मला आनंद तो कां वाटावा बरेंॽ लहान मुलाला असलीं कामें नियमानें करण्याची हौस असणें साहजिक मुळींच नाहीं. मला तर त्या साधुकडे जाऊन त्याचा समाचार घेणें, तो भुकेलेला गोसावी तें अऩ्न आतुरतेनें घेई म्हणून विशेषतः कळकळीनें तें पोचविणें; अन्न ज्या ताटांतून नेत असें त्यांत तो साधू चार दाळींबाचे दाणे, खोब-याचा लहानसा तुकडा, किंवा थोडीशी खडीसाखर प्रसाद म्हणून कांहीं तरी आपल्याजवळचें घालून ताट परत करीत असे - तो प्रसाद मी श्रद्धेनें घरीं भावंडांना आणून वाटणें वगैरें गोष्टी त्या लहान वयांत भक्तीच्याच द्योतक होत्या! केवळ भुकेलेल्यास अन्न देण्याची परोपकारी भावना किंवा साधुसमागमाची जाणूनबूजून आवड राखण्याची आध्यात्मिक भावनेला माझें तें लहान वय पात्र नव्हतें. पण ह्या दोन्हींच्या मधली एक स्थिति मी तेव्हां अनुभवीत होतों हें खरें. तिला काय नांव द्यावें हें मला आतां देखील नीट समजत नाहीं!
इतर बैरागी
मराठा जातींत कोणी तरी गोसावी गुरु करून घेण्याची परंपरा चालत आली आहे. नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेश्वर येथील विठ्ठलपुरी नांवाचे गोसावी माझे वडिलांचे गुरु होते. ते वृद्ध होते. त्यांचे शिष्य गोसावी ह्यांचा उपदेश मला आणि माझ्या भावाला बाबांनीं कान फुंकण्याचा विधि करून देवविला होता. हे गोसावी एक दोन वर्षांनीं आमचे घरीं फिरतीवर येऊन संभावना घेऊन जात. त्यावेळीं त्यांच्याशीं माझा लळा विशेष असे. तुळजापुरचे भोपे भवानराव कदम आमचे घरीं कुळदेवतेचा नवस वगैरे काय असेल तें घेऊन जाण्यास मधून मधून येत. तेही मला फार आवडत. पुढें इंग्रजी शाळेंत असतांना नाशिकाकडचे भगवानदास आणि माधवदास नांवाचे दोन वैष्णव बैरागी आमचेकडे वरचेवर येत असत. हे नुसते पांथस्थ या नात्यानें जमखंडीच्या कोठल्यातरी देवळांत उतरून बाजारांत भिक्षा मागून एक वेळ जेवून राहात. आमच्याकडून त्यांना कसलीही आकांक्षा नसे. तरी त्यांचा व आमच्या घरचा फार लोभ जडला होता. त्याचें विशेष कारण मी इंग्रजी शाळेंत जाणारा, मोठा समजूतदार, प्रेमळ मुलगा हें ओळखून, बाबा असोत नसोत, माझ्या भेटीला घरीं येऊन माझ्याशीं त्यांनी परिचय वाढविला होता. शेवटीं इंग्रजी ६ व्या ७ व्या इयत्तेंत असतांना बबलादीचे सिद्धांचें येणें जाणें फार झालें. त्यांचा माझेवरच नव्हे तर अखेरीस माझाही त्यांचेवर काय परस्पर परिणाम झाले हें मागें सांगितलेंच आहे.
योग्य पारख
देवपूजा, भजन, पोथीवाचन आणि साधूंची आवड वगैरे जे धार्मिक भावनांचे प्रकार आठवतील तसे जे मी वर सांगितले त्यावरून व आमच्या घराण्यांतील आजी आणि आई ह्यांचीं व्रतें आणि उपास ह्याविषयीं जी मीं हकिकत दिली तिच्यावरून आमच्या घराण्यांत हिंदु धर्माची जुनी परंपरा, आचारविचार आणि बाळबोधपणा कसा रुजला होता हें दिसून येतें. पण ह्यापेक्षां विशेष गोष्ट सांगावयाची ती ही कीं, जुन्या धर्माचे इतके तपशिलवार आचार आमचे घरीं चालत होते तरी केवळ कर्मठपणा, धर्मभोळेपणा, दंभ आणि दुराग्रहाचा पगडा आमच्या घरीं आईबाबांच्या वर्तनांत मला केव्हांच दिसून आला नाहीं. एकाद्या ढोंगी साधूचें कपट दिसून आलें किंवा कोणाही सांप्रदायिक अतिथीचा स्वार्थी मतलब दिसून आला कीं बाबांचा निस्पृहपणा उग्रस्वरूप धारण करीत असे. आल्या अतिथीची आमचे घरीं जरी शक्तिनुसार संभावना होण्याला कधीं चुकत नसे, तरी त्यानें एकादें दुर्वर्तन केलें किंवा त्याचा लोभी आणि मतलबी डाव दिसला तर लागलीच त्याची उलट दिशेनें संभावना करावयाला बाबा कधीं मागें घेत नसत! ह्यामुळें भलत्यासलत्या सालोमालो भटक्याला आमचे दारांत पाय ठेवण्यापूर्वीं विचार करावा लागत असे. आईच्या भक्तींत कोणताही वरपंग नव्हता. ह्या माझ्या वडिलांच्या स्वभावांतच माझ्या भावी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचीं बीजें पूर्णपणें आढळत आहेत. आईनें व्रतें जरी बरीच केलीं तरी अमक्या वेळीं अमका नवस केलाच पाहिजे, अमक्याला अमके दान दिलेंच पाहिजे असा हट्ट कधींच केला नाहीं. दोघांच्याही धर्मभावना साध्या, सहज आणि निर्हेतुक होत्या. आणि त्यांतच माझ्या ‘भावी’ धर्माचाच नव्हे तर माझ्या सर्व सामाजिक सुधारणांचाही उगम आहे.
प्रकरण १४ वें
आग्रहीपणा
दंगा, मारामारी आणि स्वैर खेळ हे बालपणाचे जन्मसिद्ध हक्क होत; आणि ते मी माझ्या परीनें-आमचे बाबांचा आम्हांवर कितीही दाब असो-बजावयाला काहीं कमी केलें नाहीं. अगदीं लहानपणीं मी शेजारच्या मुलांना मारून आईकडे कागाळ्या आणीत असे हें मला अद्यापि आठवतें. आमचे आजोबा असतांना आमच्या वाड्याच्या बाहेरच्या पटांगणांत कांहीं भाडोत्रीं कुळें राहात असत. त्यांत पाटोळे नांवाचें एक गरीब कूळ असे. त्यांचा रामू नांवाचा एक माझ्याच वयाचा लहान मुलगा असे. सहज खेळतां खेळतां मी त्याच्या डोक्यावर हात ठेवण्याचा हट्ट घेतला. पण हात ठेवूं न देण्याचा हट्ट त्यानेंही घेतला. कारण हट्ट करणें दोघांचाही सारखाच जन्मसिद्ध हक्क होता नाॽ शेवटीं आम्हा लहानग्यांची मारामारी झाली. रामू आपल्या आईकडे रडत गेला. तरी मी त्याच्या मागें लागलोंच होतों. शेवटीं ह्या खटल्याचें अपील आमचे आईकडे आलें. कारण रामूची आई माझ्या आईची मोठी मैत्रीण होती. आईनें हा खटला साहजिकच आजोबांकडे वर्ज केला. आजोबांनीं आम्हां दोघा हेकेखोरांना आपल्या समोर घेतलें आणि दोघांला खाऊ देऊं केला. पण खाऊपेक्षां मला माझ्या दावेदाराचे डोक्यावर हात ठेवण्यांतच जास्ती ईर्षा वाटत होती. रामू खाऊंला कबूल झाला, आणि मी त्याच्या डोक्यावर हात ठेविला. खटल्याचा निकाल लागला. बरा म्हणा वाईट म्हणा हा आग्रहीपणा माझ्यांत अद्यापि केंव्हा केंव्हा चमकतो!
गांवढळ खोड
म्हातारबा सुतार म्हणून माझ्या वडिलांचे एक मित्र असत. त्यांची दोन मुलें रामू आणि कृष्णा हीं अनुक्रमें माझ्या आणि माझ्या वडील भावाच्या वयाचीं असत. मी मराठी शाळेंत असतांना ह्या चौघांची फार गट्टी असे. एकदां आम्ही चौघे एकीकडे व दुसरीं आळींतील मुलें दुसरीकडे ह्यांची आमच्या घराच्या पश्चिमेस असलेल्या तळ्यांत एक मोठी मारामारी झालेली आठवते. तळ्यांत पाणी नसे. त्यांत खेळण्यास विस्तीर्ण जागा असे. पण एकदां रामू आणि माझीच मारामारी जूंपूंन आम्ही दोघेही आमच्या आळींतील मोठ्या रस्त्यांत भलीं मोठीं खोल गटारें होतीं त्यांत घाणींत पडलों होतों. रामूच्या आईनें आम्हांला दोघांला धुतलें, पुसलें, खडे कांटे रुतले होते ते काढले. आणि माझ्यापेक्षां रामूला जरी मार जास्त लागला होता तरी त्याच्या आईनें माझेंच कौतुक करून मला माझ्या आईकडे पाठविलें. विहिरीच्या जुन्या भिंतीवर एक प्रकारची बारीक लव्हाळ्याप्रमाणें वनस्पति चिकटून वाढत असे. ती वाळल्यावर आम्ही काढून आणीत असूं. ती प्रतिपक्षाच्या मानेला न कळत फासल्यावर तेथें आग सुटे. हा खरोखर आमचा दुष्टपणा आणि भ्याडपणाही खरा. पण म्हणतात ना, प्रेमांत आणि युद्धांत सगळेंच कांहीं शोभतें. मग आम्हीच कसे अपवादॽ शिमगा आला म्हणजे ह्या बालयुद्धाला नवीन जोम येई. पण जसजसा मी वरच्या वर्गांत जाऊन ब्राह्मणांच्या मुलांना हाताशीं घेऊं लागलों तसा हा गांवढळपणा कमी झाला. तरी माझ्या कांहीं वैयक्तीक खोड्या चालूच होत्या.
रामतीर्थ
दर श्रावणी सोमवारीं जमखंडीच्या पश्चिमेस रामतीर्थ म्हणून एक रम्य ठिकाण आहे, तेथें जत्रा भरत असे. इ. स. १८५७ सालच्या बंडानंतर जमखंडीचे यजमान श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनीं ह्या ठिकाणींच आपली वस्ती मांडली. पूर्वीं येथें रामेश्वराचें काय तें जुनें एक रम्य देऊळच होतें. पुढें २५।३० वर्षांत येथें विस्तीर्ण राजधानीचें स्थान झालें. पश्चिमेस डोंगराखालीं कडपट्टी म्हणून एक लहान खेडेगांव आहे. तेथें बसवण्णाचें लिंगायत पुरातन प्रतिद्ध देवालय आहे. येथें यात्रा मोठी भरत असे. ती मोडून आप्पासाहेबांनीं रामतीर्थ लोकप्रिय करण्यास ही यात्रा वर डोंगरांत आपण राहत, तेथें कांहीं वर्षें नेली. रामतीर्थास जाण्याला एक वरची डोंगराची व दुसरी खालची सपाट-गाड्या वगैरे जाण्याची-अशा दोन वाटा असत. ह्या दोन्ही वाटा सोडून अगदीं डोंगराच्या माथ्यावरून मेलगिरी लिंगाप्पाच्या देवळामागून रामेश्वराच्या देवळाला जाण्याची मीं नवीन टूम काढली. ह्याचें कारण पावसाळ्यांत डोंगरावरचीच नव्हे तर भोंवतालच्या दूरवर मैदानी प्रदेशांतील शोभा फार सुंदर दिसे.
विंचवाशीं खेळ
शिवाय आणखी एक कारण वेगळेंच होतें. ह्या डोंगरावर विंचू फार असत. ते भले मोठे काळे तांबडे असत. काळ्या विंचवाला इंगळी म्हणत. ती चावली कीं प्राणांतच! हे विंचू धरून त्यांची एक मोठी माळ करण्याची आम्हांला खोड लागली. दगड उचलला कीं खालीं विंचू आढळावयाचाच. मी तर विंचू धरण्यांत मोठा धीट व पटाईत झालों. पुढें पुढें विंचवाच्या नांगीतलें विष काढून त्याला अगदीं तळहातांत घेऊन मी इतर मुलांना चकीत करीत असें. विंचू नजरेस पडला कीं तो आपली नांगी आधीं वर करितो. तो मी चिमटींत मोठ्या शिताफीनें घट्ट पकडीत असें. मग माझ्या नखावर त्याच्या नांगीचे टोंक घासलें म्हणजे त्यांतून विषाचा एक लहानसा बिंदू बाहेर निघे. तो पुसून टाकला कीं विंचवाचें सर्व तेजच नाहींसें होई. तो आपोआपच नांगी खालीं टाके. मग त्याला कोणीही खुशाल हातावर घ्यावें. पण निस्तेज विंचवालाही हातांत घेण्याचें धैर्य कोणास नसे. मग माझ्या फुशारकीला कोठली सीमा उरणार! घरांत किंबहुना आमच्या शाळेंतही एकादां मोठा विंचू निघाला कीं मुलें मजकडे येत. मी चटकन् तो धरून त्याचें विष काढून हातावर घेई. अशा गडबडींत एकादे वेळीं चुकून मला विंचू चावतही असे. पण अभिमानास पेटून त्या वेदना मी मुकाट्यानें सहन करीत असें. कोण हा अर्कटपणा!
सहिष्णुता
दुखणें आलें किंवा जबर इजा झाली तर इतरांप्रमाणें मी विव्हळत नसें. स्वस्थ घुम्मेपणानें पडे. “विठ्या, काय तूं बेरड आहेस रे” असें आई म्हणे तिकडे माझें लक्षच नसे. ही स्पार्टन सहिष्णुता माझ्यांत जन्मतः नसून ती माझ्या मानीपणानें मी आणली होती. शिक्षकांनीं छडी मारली कीं, साधारण मुले मोठ्यानें किंकाळी फोडीत. इंग्रजी शाळेंत गेल्यापासून मला तर शिक्षकाच्या हातून मार खाण्याची कधीं अपवादादाखलही पाळी आली नाहीं. सहनशीलपणा वाढवावा म्हणून मी शिक्षक नसतांना त्यांची छडी घेऊन एकाद्या मुलाच्या हातांत देई. आणि माझ्या तळहातावरच नव्हे तर मनगटावर जोरानें मारण्यास सांगे. किती मारलें तरी मी हात खालीं घेत नसें. हात हिरवा निळा झालेला लपवून ठेवण्याचा जो त्रास होई तेवढाच काय तो. इंग्रजी सहाव्या किंवा सातव्या यत्तेंत असतांना घडलेली एक गोष्ट. आमचें नेहमीचें मित्रवलय बसलें होतें. मी दुःख किती सहन करतों, तें पाहाण्यासाठी व्यंकू कुलकर्णी ह्यानें एकदां जळती उदकाडी माझ्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागील भागावर ठेवली. ती एकदम न ठेवतां हळूच जवळ आणतां आणतां लावली. उद्देश हा कीं, पहिला चटका लावल्याबरोबर मी कचरतों कीं काय पाहण्याचा. इतकेंच नव्हे तर माझ्या तोंडांतून शब्द किंवा डोळ्यांवरून कसलेंही चिन्ह दिसलें कीं मी हरलों असें समजावयाचें ठरलें होतें. शेवटीं जळती उदकाडी बराच वेळ ठेवली तरी हूं का चूं नाहीं. उदकाडीच विझूं लागली. इतक्यांत माझ्या आईनें अकस्मात् येऊन तें पाहिलें. ती रागें भरली! माझ्या उजवा हाताचे मागें तो लहानसा व्रण अद्यापि स्पष्ट दिसत आहे. ह्या अर्वाच्यपणास काय म्हणावेंॽ
विक्षिप्तपणा
विक्षिप्तपणाचें धाडस माझ्या उपजत स्वभावांत पेरलेलेंच दिसतें. कारण मी कॉलेजांत गेल्यावरही ब-याच वेळां मी चमत्कारिक वागलों आहें. पन्हाळगड - विशाळगडची सफर मी फर्ग्युसन कॉलेजांत असतांना केली. तेव्हां किल्ल्याच्या अवघड जागीं चढून जाऊन बसणें मला आवडावयाचें. इंग्लंडांत असतांना, इंग्लिश लेक्स् मध्यें मी एकदां डॉ. कारपेंटर-आमच्या मॅंचेस्टर कॉलेजचे प्रिन्सिपाल-ह्यांचा पाहूणा होतों. बरोबर कॉलेजमधील सहाध्यायी ७।८ होते. एके दिवशीं ठरलें कीं, सूर्योदय पाहण्याला रात्रीं उठून एका डोंगराच्या शिखरावर जावयाचें. सूर्योदयापूर्वीं तेथें पोंचण्यासाठीं भल्या पहाटे उठून निघालों. डोंगरांत कांहींशी वाट उंच गेल्यावर मोठा पाऊस आला. रात्र अंधारी होती. सगळी मंडळी परतली. पण मला परतावेसें वाटेना. मी एकटाच तसा पुढें चाललों. पाऊस थांबेना, वाट दिसेना. मुलूख अगदींच अपरिचित, बरोबर कोणीच नाहीं. शेवटीं जवळच एक लहानशी गुहा लागली. तींत शिरून पावसांतून आश्रय घेतला. सुदैवानें काड्याची पेटी होती. काडी ओढून पाहातां गुहा फार लहान होती हें दिसलें. उजाडेपर्यंत रात्र तेथेंच काढावी लागली. सकाळीं उठून एकटाच भुतासारखा घरीं आलों. मिसेस कारपेंटर चिंतेंत बसल्या होत्या. कारण हें माझे करणें त्यांना फार धाडसाचें वाटलें. पण मला त्यांत कांहीं विशेष वाटलें नाहीं. ह्याच वेळीं डॉ. कारपेंटर आणि आम्ही सर्व मंडळी इंग्लिश लेक्स् डिस्ट्रिक्ट (सरोवर प्रांतीं) मध्यें वनभोजनास गेलों असतां आम्ही सर्वजण डोंगरांत एका रम्य जंगली ठिकाणीं फराळास उतरलों. जो तो स्वच्छंदानें हिंडूं फिरूं लागला. मला एक उंच झाड दिसलें. त्यावर चढण्याची मला हुक्की आली! लागलेंच चढलोंही. पण उतरतां येईना. कारण पायांत बूट घालून कसातरी चढलों तरी उतरतांना बुटासह पाय घसरूं लागले. बूट नसते तर उतरणें सोपें होतें. पण मंडळींत बूट काढणेंही बरें नव्हतें. लागलों घुटमळायला. अखेर एका फांदीच्या शेवटीं जाऊन ती वाकवून खालीं उडी घेतली. त्यावेळीं तर मिसेस कारपेंटरनीं किंकाळीच फोडली. आणि पुनः असल्या चेष्टा करूं नकोस म्हणून तिनें गंभीरपणानें बजावलें. स्कॉटलंडांतील सरोवर प्रांतांत तर मी एकटाच रोज २०।२५ मैल सरोवरावरून बोटींतून जाई. आणि उंच डोंगराच्या अगदीं शिखरावर एकटाच तास न् तास जाऊन बसे. भीति वाटत नसे. भिण्यासारखे कांहीं नव्हतेंही. हॉटेलांत श्रीमंती चोचले करणा-या मंडळींत न मिसळतां कोठेंतरी अगदीं एकांतवासांतील गरिबांच्या झोंपडींत उतरत असें. सॅवरडेनॉन नांवाच्या खेड्यांत एका गरीब कुटुंबांत मी उतरलों होतों. तेथील लहान मुलांना घेऊन मी लॉक् लोमंड सरोवरावर एकदां फिरत होतों. मनांत आलें कीं पोहावें. कपडे काढून घेतली उडी! जरी उन्हाळा होता तरी सरोवराचें पाणी इतके थंड होतें कीं मी पडल्याबरोबर गांरठलों. अंगाची मूठ वळावयाला लागली. पायाला गोळे येऊं लागले. मग पोहतों कसचा! मोठ्या प्रयासानें कांठाला लागलों. लहान मुलें घाबरून गेलीं. हा जीवावरचा प्रसंग गुदरला!
शर्यत
मी मराठी शाळेंत असतांना १०।१२ वर्षांचा होईपर्यंत तर फारच उतावळा, चळवळ्या व खोडकर होतों. पण माझा वडील भाऊ पाठीराखा नेहमीं असे, म्हणूनच बाहेर गेलेला मी सुरक्षित घरीं येत असे. एरवीं आईला मोठी काळजीच असे. चैत्र महिन्यांत रामतीर्थांत श्रीमंत अप्पासाहेब गुरांचें जंगी प्रदर्शन करीत. त्यावेळीं मोठमोठ्या शक्तिवान बैलांची ओझ्याने भरलेल्या गाड्या ओढण्याची शर्यत होत असे. ती पाहण्यास गांवोगांवच्या लोकांची मोठी गर्दी जमे. एकदां ही शर्यत पाहाण्यास मी आणि माझा भाऊ गेलों होतों. गर्दीत आम्हां मुलांस कसें दिसणारॽ म्हणून आम्ही एका मोठ्या झाडावर चढलों. पण त्या झाडावरही अगोदरच पुष्कळ माणसें चढून पाहात होती. त्या झाडाच्या एका मोठ्या उंच आणि लांब फांदीवर इतकीं माणसें गर्दी करून बसलीं कीं शेवटीं भार सहन न होऊन ती सबंध फांदी माणसांसह तुटून खालीं पडली. पण खालीं देखील माणसांची गर्दींच होती. त्यामुळें मोठा हाःहाःकार झाला. त्यांत मीही उंचीवरून खालीं पडलों. गर्दींत पडलों म्हणून हातपाय मोडले नाहींत. पण विलक्षण ओरखडलें होतें. इतक्यांत पोलीसची धराधरी चालली. तेव्हां जीव घेऊन पळत सुटलों. पण माझे लग्नांतलें मोठें लांब लाल पागोटें झाडाच्या फांदींत अडकलेलें, लग्नांतला लांब चिटाचा अंगरखा फाटलेला, शिवाय धोतर पायांत अडकत होतें. पोलीस तर धरावयास जवळ आलेला. अहाहा! काय तो प्रसंग! पण सर्वांना चुकवून पोगोटेंही झटकन ओढून घेऊन शेंडी सावरीत जी धूम ठोकली तों दीड मैल मागें न पाहातां घरापर्यंत मजल गाठली. पण मरण पुढेंच अद्यापि होतें. घरीं बाबांनीं फाटके कपडे पाहिल्यावर काय दशा होईल ती आठवून पोलीसपेक्षांही ह्या नवीन धास्तीनें काळीज धडधडू लागलें. घरीं कांहीं प्रवेश करण्याची छाती होईना. वाकून पाहात बाबा आहेत काय, कोठें बसले आहेत ह्याचा कानोसा घेतल्यावर चोराप्रमाणें आंत शिरलों. बाबा घरीं नाहींत हें पाहून हायसें वाटलें व सर्व श्रमांचा परिहार झाला.
विशेष करामत
शिमग्यांत एकदां अशीच खोड मोडली. शिमग्याचे दिवसांत चांदण्या रात्रीं, बाबांच्या डोळा चुकवून उनाडक्या करीत फिरत असूं. विशेष करामत म्हणजे वेश्यांच्या आळींत बदफैली लोकांच्या नांवानें शिमग्यांतल्या अचकट विचकट म्हणी म्हणत अभद्र ध्वनि काढीत मध्यरात्र उलटून जाईपर्यंत हिंडावयाचें; आणि पुनः धुलवडीच्या सकाळीं भुताटकी करावयाची, ती निराळीच! एकदां काय झालें, मी कांहीं मुलांबरोबर एका वेश्येच्या घराजवळ वाईट गाणीं म्हणत बोंबलत गेलों. मुलांच्या नादीं लागून तिच्या दाराशीं दंगामस्ती करू लागलों. आंतून बाळा काणे नांवाचा एक तरुण ब्राह्मण त्रासून आला व त्यानें मलाच पकडलें. त्याच शिक्षकानें मला शाळेंत घालण्याचा प्रथम मुहूर्त करण्याचा धडा घालून दिला असें मागें सांगितलेंच आहे. तो फार रागीट व दांडगा होता. उभ्या वर्गांत मुलांना मारूं लागला तर एकाच हातानें न मारतां दोन्ही हातांनीं गुराला मारल्याप्रमाणें झोडपीत सुटे. ही त्याची मारकट प्रसिद्धी मला माहीत होतीच. अशा यमाच्या हातीं सांपडल्यानें माझी गाळण उडाली. त्यानें संतापून माझें डोकें धरलें होतें. त्याच्या हातांत माझा रुमालच ठेवून मी खालीं झुकांडी देऊन निसटलों, तों सूं बाल्या केला. बाळा काण्यांच्या हातून सुटलों; पण रुमालाशिवाय घरांत बाबांपुढें कसें चालणार! शेवटीं माझा वडीलभाऊ ह्या काण्याकडे गेला आणि मी रामजीबोवांचा मुलगा असें कळल्यावर त्या यमाचीच उलट गाळण उडाली. रुमाल परत देऊन झालेली गोष्ट बाबांना कळवूं नको अशी उलट माझ्या भावाचीच तो गयावया करूं लागला. अशानें हा प्रसंग टळला! मीं मोठा झाल्यावर शिमग्यांतले अनाचार व अत्याचार बंद करण्यासाठीं होलिका संमेलनाची महाराष्ट्रभर मोठी चळवळ केली, तींत बरेंच यशही आलें. मुंबईंत ह्या कार्याचा आद्य व मुख्य प्रवर्तक मीच हें सर्व खरें; पण बाळपणच्या माझ्या लीलांची वाट कायॽ मोठेपणीं होलिका संमेलनांत साळसुदपणें लंबी व्याख्यानें देतांना मध्येंच एकादेवेळीं बाळा काणे आठवल्याबरोबर माझी बोबडीच वळे. एवढ्या प्रसिद्ध वक्त्याच्या तोंडाला मध्येंच कां खीळ पडली असें श्रोत्यांस वाटे. पण अंदरकी बात राम जाने!