प्रकरण २० वें
हायस्कुलांत असतांना विशेषतः ४ थ्या ५ व्या यत्तेपासून पुढें माझ्यामध्यें भावी सामाजिक सुधारणेचें बीजारोपण कसें होऊं लागलें ह्यासंबंधींच्या आठवणी देऊन मी हा हायस्कूलचा काळ पूर्ण करणार आहें. ह्यालाही माझ्या आईबाबांचा धर्म आणि शील हीच केवळ कारणीभूत आहेत.
भावंडांचीं नांवें
माझ्या आजाआजीचा धर्म कसाही असो. ते जिवंत असे तोंपर्यंत जरी माझ्या आईबाबांनीं त्यांच्या पुरातन देवदेवींच्या उपासनेची परंपरा बिनतक्रार चालविली होती, तरी ती त्यांच्या पाठीमागें फार दिवस टिकली नाहीं. आजाआजी असतांनाच बाबांचा पंढरपूरच्या वारकरी पंथांत नुसता प्रवेशच नव्हे तर पुढाकारही चालू होता. माझ्या वडील भावाचें लाडकें नांव जरी भाऊ असें होतें तरी त्याचें पाळण्यांत ठेविलेलें खरें नांव परशुराम हें होतें. श्रीयल्लमा हें रेणुकादेवी-जमदग्नी ऋषीची पत्नी - हिचे तेलगू अथवा कानडी नांव होय. तिचा मुलगा परशुराम. हें नांव माझ्या भावाला श्रीयल्लमाची भक्ति करणारी जी माझी आजी तिनें ठेविलें असावें. पण पुढील सर्व मुलांचीं नांवें माझ्या बाबांनीं आपल्या पंढरपूरच्या भागवत संप्रदायाप्रमाणें ठेविलेलीं आहेत. तीं अशीं. परशुरामाच्या पाठीवरच्या आणि माझ्या आधींच्या मुलाचें नाव कृष्णा. हा लहान असतांनाच माझे आईचे अंगाखालीं झोपेंत चेंगरून मरण पावला हें मागें आलेंच आहे. ह्यानंतर माझें नांव विठू. जन्म पत्रिकेंत माझें पाळण्यांत ठेविलेलें नांव तुकाराम असें आढळतें. माझ्या जन्माचेवेळीं बाबा पंढरपूरच्या वारीला गेले होते. म्हणून परत आल्यावर त्यांनीं माझें नांव विठ्ठल हें ठेविलें. मी पांचवा मुलगा. माझ्यानंतरचा मुलगा नांव ठेवण्यापूर्वीं ६।७ वे दिवशींच वारला. नंतर मुलगी झाली. ती ७ वी जनाक्का. ही कार्तिक शुद्ध एकादशीस जन्मली. ह्यावेळींही बाबा पंढरपुरास जाऊन आले असावेत. आठवी मुलगी तान्याक्का हिचें पाळण्यांतलें नांव मुक्ताबाई असें आहे. पुढें जीं बरींच मुलें झालीं तीं लहानपणींच वारलीं. त्यांपैकीं एकाचें नांव दत्त होतें. शेवटचा मुलगा एकनाथ. अगदीं अखेरचें मूल चंद्राबाई. हें नांव मात्र बबलादी सिद्धांचे जे उपास्य दैवत चंद्रगिरीताई असें होतें तिचेवरून ठेविलें होतें. एकंदरींत वारकरी पंथाच्या साध्या, उदार, प्रागतिक, भागवत धर्माचा पगडा माझ्या वडिलांच्या मनावर आणि अकृत्रिम शीलावरही बसला होता ह्यात शंका नाहीं. त्याचींच हीं नांवें साक्ष देतात!
मातापित्यांचें ऋण
तुकाराम हें नांव मागें पडून विठू हें नांव माझें कसें पुढें रूढ झालें त्याचा जरी शोध आतां नीट लागण्याचा संभव नाहीं; तरी माझ्या बाबांच्या भागवत धर्मांतून स्वतः माझी भावी सामाजिक सुधारणा कशी उदय पावली हें शोधून काढणें तितकें कठीण नाहीं.
“ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
कोणाहि जीवाचा न घडो मत्सर । वर्ण सर्वेश्वर पूजनाचें ॥१॥
हा तुकारामाचा अभंग सर्वच वारकरी म्हणतात. पण त्याचा जोराचा ठसा बाबांनींच नव्हे तर माझ्या आईनेंही माझ्या ग्रहणशील हृदयावर आपल्या प्रत्यक्ष आणि पदोपदीच्या प्रेमळ आचरणानें जो उठविला आहे; त्यांत ज्या भावी साधारण ब्राह्मसमाजाचा मी प्रचारक झालों त्यानेंही विशेष भर टाकिली असें माझ्यानें म्हणवत नाहीं.
ज्ञानदेवें घातला पाया । तुका झाला कळस ॥
ह्या उक्तीप्रमाणें ज्या शुद्ध भागवत धर्माची प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्रांत झाली त्यांतच उदार, सामाजिक प्रागतिकतेची व सहानुभूतिपूर्ण सहिष्णुतेचीं भरपूर बीजें होतीं, तरी महाराष्ट्रांत १९ व्या शतकांत सामाजिक सुधारणेचा म्हणण्यासारखा कां प्रकर्ष झाला नाहीं हें सांगण्याचें हें स्थळ नव्हे.
“ निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ।
आवडीनें नामें गाती, ते नर पावती मंगल धाम ।।
हें सुंदर भजन म्हणून नाचणा-या पुष्कळ वारक-यांच्या आचरणामध्यें वरील साधूंच्या शुद्ध शिकवणीचा मेळ दिसत नाहीं. पण माझ्या वडिलांच्या आचरणाविरुद्ध मला ही कुरकुर करावयाला मुळींच जागा नाहीं, ह्या गोष्टींचा मला मोठा अभिमान वाटतो. प्रार्थना अगर ब्राह्म समाजाचा परिणाम अद्यापि मराठ्यांवरच नव्हे, इतरही महाराष्ट्रियांवर झालेला नसून मी मात्र आज ह्या समाजाचा एक कां होईना पण अपात्र प्रचारक म्हणून वावरत आहें. ह्यांत कांहीं श्रेय असेल तर मोठा भाग ह्या समाजापेक्षां माझ्या वडिलांनीं घालून दिलेल्या जिवंत आचरणाच्या धड्यांकडेच जास्त जात आहे! आमचें घराणें मूळचें दक्षिणेकडील अस्सल कर्नाटकांतलें. राजपुतांशीं संबंध लावणा-या उत्तरेकडील मराठ्यांपेक्षां दक्षिणेकडील देशस्थ मराठे साध्या राहणीचे व बाळबोध वळणांतले. ह्यांचा मराठमोळा पडदानशीन् नख-याचा नाहीं, किंवा ब्राह्मणी सोंवळेपणाच्या जातिभेदालाही फारसा जुमानणारा नाहीं. निदान माझ्या पाहाण्यांत माझ्या आजीपासून तरी ह्या दोन सामाजिक विषांची बाधा आमचे घरीं दिसून आली नाहीं. ह्यांत माझ्या बाबांनीं आपल्या सहजसुंदर भागवत धर्माची भर टाकिली. “कोणाही जीवाचा न घडो मत्सर” हें वर्म तर माझ्या आईच्या स्वभावांत अगदीं श्वासोच्छ्वासाप्रमाणें सहज भिनलें होतें. ह्यांत मी पामरानें कांहींच भर टाकणें शक्य नव्हतें.
पवित्र वातावरण
आमच्या घरीं पडदा नव्हता इतकेंच नव्हे तर बाहेरची कोणी सभ्य आणि विश्वासार्ह पाहुणे मंडळी अगर मित्र मंडळी आली, तर त्यांच्याशीं आमच्या घरचीं स्त्रीपुरुष आणि लहान थोर सर्व माणसें फार मोकळेपणानें व आपलेपणानें वागत असत. ह्या स्वाभाविक बाळबोधपणामुळें आमच्या घरीं येणा-यांना अगदीं पवित्र आणि भारलेल्या वातावरणांत उतरल्याप्रमाणें अनुभव येई, असें कित्येकांनीं आमचेजवळ उघड उद्गार काढावे. माझ्या मित्रांना आमच्या घरच्या अकृत्रिम व निष्कपट चालीरीति, घरांतील लोकांचा एकमेकांशीं स्नेह व गोड वागणूक आणि दुस-यांशीं तसेंच वर्तन अगदीं नमुनेदार वाटत. कांहीं तर नवीन आलेले स्नेही कांहीं गोष्टींकडे टक लावून पाहातच बसत! आमचे घरची शांति, तृप्ति, प्रीति ह्या कांहीं अवर्णनीय त्यांना वाटत. आमच्या घरीं आल्यावर एकाद्या पुरातन देवळांत गेल्याचा त्यांना भास होऊन, परत जावेंसें वाटत नसे! आमचे बाबा आपल्या मुलींना “आई” म्हणून हाक मारीत असत; ही लहानशीच गोष्ट पण परकीयांवर ह्या गोष्टींतील सहृदयतेचा परिणाम चटकन् होई. माझ्या दोन लहान बहिणी माझ्या लहानग्या मित्राबरोबर अगदीं भावांप्रमाणें लडिवाळपणानें व मोकळेपणानें वागत आणि आई तर माझ्या कोणाही मित्राला आपल्याच मुलाप्रमाणें वागवावयाला केव्हांही तयार असे. ह्यामुळें आमचे घरीं विश्वकुटुंबियतेचा जिवंत देखावा अथवा साक्षात्कार दिसे. नुसता पडदा न घालणें ह्यांत कांहीं विशेष नाहीं. पण अंतःकरणांतच मुळीं पडद्याला थारा न देणें ही दैवी कृपा होय. आमचें घर म्हणजे ह्या कृपेचा एक देव्हारा होता! प्रापंचिक विपत्ति कितीही आल्या; दारिद्र्य, आजार, मरण, कर्जाचा बोजा असले इतर कितीही मनाची पारख करणारे प्रसंग आले तरी घरचे शांतीचें वातावरण कधीं क्षुब्ध होत नसे. येणेंप्रमाणें भौतिक दारिद्र्यांत आत्मिक श्रीमंतीचा भोग आमचे घरीं आणि घरांतील लहानथोर व्यक्तींत दिसत असे. अशा घरीं मग जातिभेदाला कोठून वाव मिळणार! आधुनिक सुधारकांप्रमाणें जातिभेद मोडण्याची उठाठेव करण्याची आम्हांवर कधीं पाळीच येत नसे. कारण तो जातिभेदाचा संस्कारच आम्हांवर घडला नव्हता. मग तो मोडण्याची वार्ता कोठून येणारॽ लहान मुलापुढें मद्यपान निषेधाच्या किंवा व्यभिचार निषेधाच्या व्याख्यानाची जरुरीच नसते. किंबहुना तीं हास्यास्पद ठरतात. त्याप्रमाणें जातिभेद मोडण्याचा कोणी आम्हांला उपदेश केला असता तर तो मुळी आम्हांला समजलाही नसता, इतके आम्ही ह्या भेदाच्या अमंगळ विषाचे अनभिज्ञ होतों!
मुलींचे शिक्षण
शिक्षणाचे बाबतींत आमच्या घराण्याचा त्या प्रांतांत मोठा विशेष होता. बाबांनीं जें पुस्तकी शिक्षण आणि जी बहुश्रुतता मिळविली ती त्या काळचे मानानें नावाजण्यासारखी होती. आणि मीही पुढें हायस्कुलांत जाऊन सतत नंबर पहिला ठेविला, इतकेंच नव्हे त्या काळच्या विद्यार्थी वर्गांत अग्रगण्य झालों; ह्याचें प्रत्यक्ष श्रेय जरी बाबांला नाहीं तरी अप्रत्यक्षपणें पूर्व भूमिका तयार केल्याचें श्रेय त्यांचेकडेच जातें. पण ह्यापेक्षांही त्यांच्या प्रागतिकपणाचें मोठें कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनीं आपल्या दोन्ही मुलींनाही शाळेंत घातलें ही होय. मी जसा माझ्या हायस्कुलांतला अगदीं पहिल्या अमदानींतला मुलगा तशा माझ्या बहिणी त्या वेळच्या मुलींच्या शाळेंतल्या जवळ जवळ पहिल्याच विद्यार्थिनी होत्या! जनाक्का आणि तान्याक्का ह्या दोघी माझेपेक्षां धाकट्या बहिणी. पहिली मोठी हुशार सतेज दिसे, दुसरी धाकटी मात्र अगदीं भोळी आणि बुद्धीनें मागासलेली असे. जनाक्का बाबांची विशेष लाडकी. क्षत्रिय घराण्यांत लहानपणीं मुलींना मुलांचाच पोषाख घालण्याची ब-याच ठिकाणीं चाल आहे. इतकेंच नव्हे तर अशा मुलींना वडील केव्हां केव्हां सभांतून व दरबारांतून अशाच पुरुषी पोषाखांत घेऊन जात असतात. जनाक्काचा हा पोषाख व त्या वेळचें तिचें बाळसें बाबांनाच नव्हे तर आमच्या घरच्या सर्व मंडळींना आवडत असे. स्वतः आम्हीं मुलांनीं कधीं विजार घातली नाहीं तरी पण जनाक्काला ऊर्फ आपल्या “आईला” बाबांनीं कोल्हापुरी पद्धतीची तुमान करून आवडीनें घालावी! आणि तिनेंही ती घालून मोठ्या दिमाखानें आम्हांपुढें यावें!
स्वभाव - लक्षणें
वरील परिस्थितींत वाढल्यामुळें माझ्या भावी सुधारणेची तयारी कशी झाली हें निराळें फारसें सांगावयाला नको. स्वातंत्र्याची प्रीति, नित्य नव्या जीवनाचा शोक व सत्याचा छडा लावण्याची जन्मजात हौस हीं माझ्या स्वभावाचीं मुख्य लक्षणें होतीं. आणि ह्या लक्षणांना कोणत्याही त-हेनें आळा घालण्याचा माझ्या आईबाबांनीं कधींही प्रयत्न केला नाहीं, हें केवढें माझें भाग्य! कुरणांत चरणा-या आईबापांजवळ त्यांचें शिंगरूं ज्याप्रमाणें स्वच्छंदानें बागडत असतें; तद्वत माझ्या आईबाबांचा मला आश्रय होता; पण दाब कसलाही नव्हता! फार तर काय मीं एखादी चांगली पण अगदीं नवी आणि रुढीविरुद्ध गोष्ट केली तर उलट तिचें तें कौतुकच करावयाला तयार असत! ही अपूर्व संधि माझ्या सुधारणेला मिळाली.
अभेद भाव
हायस्कुलांत गेल्यावर माझ्या अभ्यासांत जसे नवे नवे विषय येऊन त्यांत माझी अप्रतिहत गति होऊं लागून माझ्या चैतन्यक्षितिजाचें वलय दिवसेंदिवस वाढूं लागलें; तसेंच मला निरनिराळ्या जातीचे व संस्कृतीचे मित्र आणि सोबती मिळत जाऊन, माझ्या विचाराला आचाराचें स्वरूप देण्याचे प्रयोग करण्यालाही वाव मला मिळूं लागला. ब्राह्मण, लिंगायतासारख्या ज्या जाति मराठ्यांकडे जेवत नाहींत त्या जातींचीं माणसें आमचे विश्वकुटुंबिय घरीं जेवत. इतकेंच नव्हे तर न्हावी, धोबी वगैरे ज्या इतर हिंदूंकडे किंवा मुसलमान वगैरे परधर्मीयांकडे मराठे जेवीत नाहींत; त्या जातीचे लोकांशींही पंक्तिभेद करण्याचें पाप आमचे घरीं कधीं घडत नसे. पण मी पुढें जेव्हां माझ्या मित्रांशीं मिळून मिसळून वागूं लागलों तेव्हा ह्यापुढची पायरी मला चढावी लागली, ती अशी.
मुसलमान स्नेही
इंग्रजी चवथ्या किंवा पांचव्या यत्तेंत असतांना मूर्तूजा नांवाचा एक माझा मुसलमान स्नेही होता. तो माझ्या घरीं नेहमीं येत असे व जेवतही असे. त्यानें एके दिवशीं सहज मला आपल्या घरीं जेवावयास बोलावलें. परजातीच्या माणसाचे घरीं प्रत्यक्ष जाऊन जेवण्याचा माझ्या जन्मांतला तो अगदीं पहिला प्रसंग होता. मी लागलाच कबूल तर झालोंच; पण जेवणाला बसलों तेव्हां मी कांहीं तरी अपूर्व गोष्ट करितों असें मला वाटूं लागलेलें स्पष्ट आठवतें. त्यावेळीं माझें वय फार तर १४।१५ वर्षांचें असावें. मूर्तूजाला व त्याच्या घरच्या माणसांला तर माझ्या ह्या मोकळेपणाचें जास्तच आश्चर्य वाटलें. ह्यानंतर मी सहाव्या आणि सातव्या इयत्तेंत गेल्यावर सय्यद मीरासाहेब हतरुट ह्या पोक्त मुसलमान गृहस्थाचा माझ्याशीं प्रथम परिचय व नंतर अगदीं जिवलग स्नेह जडला. मीरासाहेब आमच्या घरीं आणि मी त्यांचे घरीं अगदीं उघड जेवत असूं. इतकेंच नव्हे ह्या माझ्या सुधारकी वर्तनानेंच आमचा परस्परांचा लोभ जडला. तो इतका कीं पुढें कांहीं वर्षांनीं ते वारल्यावरही त्यांचे थोरले चिरंजीव सय्यद अबदुल कादीर हे मला आपल्या मुलाप्रमाणें वाटूं लागलें. त्यांनीं शेवटीं ब्राह्मधर्माचा स्वीकार करून ते प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. शिवाय मी स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (Depressed Classes Mission Society of India) चें ते एक आस्थेवाईक प्रचारकही झाले! माझ्या सुधारकी बाण्याचा प्रत्यक्ष मीरासाहेबावरही परिणाम असा झाला कीं ते एक मुसलमान गृहस्थ असल्यामुळें त्यांचे घरीं अर्थात् स्त्रियांचा पडदा होता. तरी मीरासाहेबांनीं माझी आपल्या पत्नीची ओळख करून दिली होती व मजपुढें त्या पडदा पाळीत नसत. ही मोठी विशेष गोष्ट होती!
शुद्ध तत्त्वें
वरील गोष्टीचा विशेष खालील कारणांत आहे. आमच्या घरीं जीं साहजिक सुधारणेचीं तत्त्वें पाळलीं जात तीं समता आणि स्वतंत्रता; उदारता आणि स्वाभिमान ह्यांच्या समतोलांत होतीं. आमचे घरीं जे वरिष्ठ म्हणविणा-या ब्राह्मण, लिंगायत जातीचे सभ्य गृहस्थ येत असत; ते जर आपला पोकळ डौल सोडून आमच्याशीं समानतेनें व ख-या प्रेमानें वागत असले तरच आम्ही त्यांच्या घरीं जेवावयास जात असूं व त्यांच्याशीं घरोबा राखीत असूं. येरवीं ते कितीही श्रीमंत किंवा घरंदाज असले तरी आम्ही त्यांचेकडे ते ब्राह्मण आहेत अगर लिंगायत आहेत येवढ्याच कारणानें जेवावयास जात नसूं! त्याचप्रमाणें मराठ्यांपेक्षां खालच्या मानलेल्या किंवा मुसलमानांसारख्या परधर्माच्या मित्रांकडे जेवावयाला जावयाचें झाल्यास त्यांच्यांत समानतेचें, स्वतंत्रतेचें अंतःकरणापासून प्रेमाचें नातें असेल तरच जात असूं; येरवीं नाहीं. ह्या न्यायानें मीरासाहेबांना किंवा त्यांच्या पत्नींना आमच्या घराण्यापुरता तरी आपला पडदानशीनपणा सोडावा लागला, हें सहजच आहे. अशा गोष्टी केवळ देवाण घेवाण ह्या व्यापारी तत्त्वानें किंबहुना आधुनिक सुधारकांच्या शुद्ध बुद्धिवादानेंही घडून येण्यासारख्या नसतात. अंतःकरणाचा जिव्हाळा, हेतूचा शुद्धपणा आणि अकृत्रिम प्रेम हा सर्व सुधारणांचा अढळ पाया होय. ह्याच तत्त्वावर आमच्या घराण्याला त्या जुन्या काळीं व जमखंडीसारख्या मागासलेल्या अथवा कानाकोप-यांतल्या प्रांतीं एवढी प्रागतिकता राखतां आली. आणि तींच शुद्ध स्नेहाचीं तत्त्वें माझ्या हायस्कूलच्या काळांत माझ्या स्नेह्यांशीं आमच्या परस्पर वर्तनांत होती. पडदा, शिक्षण, जातिभेद वगैरेंचे बाबतींत इतकी प्रगति करून आमच्या विवाहाचे बाबतींत मात्र बाबांनीं असा अविचार कां केला ह्यांचा वरील कारणांवरून खुलासा होण्यासारखा आहे. तो असा कीं, त्यांची प्रागतिकता केवळ नवीन बुद्धिवादावर किंवा विचारावरून अवलंबून नव्हती. ती निर्मळ अंतःकरणावर व दांभिकपणाच्या अभावावर अवलंबून होती आणि ह्याच वळणानुसार माझेंही वर्तन घडत होतें. हायस्कूलमध्यें नवीन वाङ्मय, नवीन विषयांचें अध्ययन व नवीन संस्कृतीचा परिचय घडल्यामुळें माझ्या स्वतःमध्यें कांहीं अंशीं बुद्धिवादाचा अंकुर दिसूं लागला होता. तो हायस्कूलचा काळ संपल्यावर—म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत गेल्यावर अर्थात् जोरानें फोंफावूं लागला. पण सातव्या यत्तेंत असतांना त्या बुद्धिवादाची पूर्वचिन्हें थोडींशीं माझ्या वर्तनांत दिसूं लागलीं होतीं. घरीं माझें वजन घरगुती बाबतींत बाबांवरही पडूं लागलें. त्यामुळें त्यांनीं माझी धाकटी बहीण मुक्ताबाई हिच्या विवाहाची घाई केली नाहीं. एरवीं उपवर होण्यापूर्वीं मुलींचें लग्न झालेंच पाहिजे, ह्या समजुतीला जर आईबाबा चिकटले असते तर मुक्ताबाईचें लग्न माझ्या आणि जनाक्काच्या प्रमाणें त्यांनीं लहानपणींच उरकून घेतलें असतें. मुक्ताबाईचें लग्न ती जवळ जवळ १४ वर्षांची झाल्यावर झालें. त्यावेळीं मी कॉलेजांत होतों. असो.
सहृदयता
मी मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला पुणें सेंटरला बसून इ.स. १८९१ च्या नवंबर-डिसेंबर मध्यें पास झालों. त्या वेळीं माझें वय १८ वर्षांचें होतें. ह्या कोवळ्या वयांत आणि मागासलेल्या कर्नाटक प्रांतांतील जमखंडीसारख्या एका छोट्या ब्राह्मणी संस्कृतीच्या संस्थानांत त्या जुन्या काळांत माझ्या हातून सामाजिक सुधारणेचे जाणूनबुजून प्रयत्न होण्याचा प्रश्न नव्हता. वर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या केवळ माझ्या भांवी सुधारणेची पूर्व चिन्हें एवढ्याच अर्थानें सांगितल्या आहेत. पण ह्यांत एका महत्त्वाच्या तत्त्वाचा येथेंच निर्देश करणें बरें वाटतें. तें तत्त्व म्हणजे सामाजिक असो अगर धार्मिक असो कोणत्याही ख-या सुधारणेचें मूळ कारण शुद्ध बुद्धिवाद आहे किंवा सहृदयता आहे ह्याचा निर्णय हें होय. पण ह्या निर्णयाचे बाबतींत माझा कल दुस-या कारणाकडे म्हणजे सहृदयतेकडे जास्त आहे. हीच गोष्ट मीं वर लिहिलेल्या आठवणींतून ब-याच अंशीं सिद्ध होऊं पाहते. निदान त्या वेळच्या माझ्या हायस्कूलच्या शिक्षणांत तरी शुद्ध बुद्धिवादाचा प्रादुर्भाव करून देणारे विषय म्हणजे रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र ह्यांच्या मूलतत्त्वांचीं लहान पुस्तकेंच होत. एका वर्षांत ह्यांची शिकवण ती काय आणि त्यामुळें माझ्या विचारसरणीस निराळें वळण लागणें फारसें संभवनीय नव्हतें. ह्यावरून असें दिसतें कीं, माझ्या आणि माझ्या आईबाबांच्या वर्तनांतील वर सांगितलेला उदारपणा व प्रागतिकपणा ह्याचें कारण माझी व त्यांची सहृदयता, न्यायाकडे प्रवृत्ति, आणि दांभिकपणाचा तिटकारा हेच गुण होते. मी पुढें कॉलेजांत गेल्यावर ह्या स्वाभाविक गुणांत बुद्धिवादाची भर पडली एवढेंच फार तर म्हणतां येईल.
इतराजी
मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यावर पुढील सबंध वर्ष पुढें काय करावें या विवंचनेंत गेलें. नोकरी पाहण्यासाठीं बेळगांवांस सुमारें सहा महिने काढले. तरी कोठें दाद लागेना. शेवटीं जमखंडी हायस्कुलांत शिक्षंकाची जागा रिकामी झाली म्हणून हेडमास्तर श्री. त्रिंबकराव खांडेकर यांनीं मला जंमखंडीस बोलावून घेतलें; आणि रिकामी जागा मला दिली. इंग्रजी २-या यत्तेवर २।३ महिने काम केलें नाहीं तोंच श्रीमंत सरकारांनीं मला रामतीर्थास बोलावून नेलें व मुंबईस व्हेटरनरी कॉलेजमध्यें स्कॉलरशिप देऊन पाठवितो असें म्हणाले. पण मी त्यावेळीं उत्तर दिलें कीं, ‘मला जनावराचा डॉक्टर व्हावयाचें नाहीं. आर्टस् कॉलेजमधील स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे.’ यावरून यजमानास राग येऊन त्यांनीं मला ताबडतोब नोकरीवरून दूर केलें आणि दिपवाळीचा पगारही दिला नाहीं. कांहीं अपराध नसतां असें झाल्यामुळें मला फारच वाईट वाटलें.
प्रकरण २२ वें
कॉलेजचा पसारा
मी जमखंडी येथील हायस्कुलांत पहिल्या यत्तेंत इ. स. १८८५ सालीं गेलों त्यावेळीं तें हायस्कूल झालें नव्हतें. त्याचप्रमाणें मी फर्ग्युसन कॉलेजांतील पहिल्या म्हणजे प्रिव्हियसच्या वर्गात इ. स. १८९३ सालाचे आरंभीं गेलों, तेव्हां तें कॉलेज फुलग्रेड कॉलेज झालें होतें कीं नाहीं हें मला आठवत नाहीं. निदान बी. ए. चा वर्ग त्यावेळीं असला तरी तो सुरू होऊन फार वर्षें झालीं असतील असें मला वाटत नाहीं. कॉलेज पुणें गांवांत शनिवार पेठेंतील गद्रे ह्यांच्या वाड्यांत भरत होतें, त्यांतच न्यू इंग्लिश स्कूलही भरत होतें. त्याला लागूनच होळकरांचा मोठा वाडाही आहे. तो मी पुढें इंटरमिजिएट वर्गांत गेल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे आला होता. त्यावेळीं शिक्षणासाठीं ह्या मंडळीच्या एवढ्याच इमारती होत्या. खेळण्यासाठीं पुढें लवकरच नारायण पेठेंतील नदीजवळचा कबूतरखानाही मिळाला असावा. कारण आम्ही इंटरमिजिएटमध्यें असतांना तेथें फुटबॉल खेळत होतों.
व्याख्यान पद्धति
प्रिव्हियसचा क्लास त्यावेळीं गद्रेवाड्याच्या समोरच्या मोठ्या दिवाणखान्यांत भरत असे. आमच्या वेळीं देखील हा भव्य दिवाणखाना भरेल इतके सुमारें ६०।७५ विद्यार्थी तरी असत. ह्या वर्गांत पोट तुकड्या नव्हत्या. त्यामुळें हा क्लास म्हणजे एक मेंढवाडाच दिसत असे. मराठी प्राथमिक शाळा सोडून जमखंडीस हायस्कुलांत गेल्यावर मला जसें नव्या जगांत व संस्कृतींत स्थित्यंतर झाल्याप्रमाणें वाटलें तसें येथें झालें. कॉलेजांतल्या शिक्षणाच्या फरकाचें मुख्य लक्षण म्हणजे व्याख्यानपद्धति ही होय. ही पद्धत बरी असो वाईट असो, शें-पन्नास मुलांनीं एका उंच पीठावर बसलेल्या अगर उभ्या असलेल्या शिक्षकाचें निरुपण अगर प्रवचन ऐकत बसणें म्हणजे हायस्कूल मधल्या वैयक्तिक पद्धतीला मुकणेंच होय. हायस्कुलांत तीस मुलांपेक्षां अधिक शिष्यसमुदाय असणें शक्य व इष्ट नाहीं. कॉलेजांत ह्या संख्येला आळाच नसतो. त्यामुळें शिक्षकाचा शिष्याशीं व्यक्तिगत संबंध तुटतो आणि विद्यार्थी धागा तुटलेल्या पतंगाप्रमाणें शिक्षकापासून किती लांब गेला असतो हें शिक्षकास कळणें जवळजवळ अशक्य होतें. तथापि आम्ही व्याख्यान ऐकणारे सभ्य गृहस्थ (Gentlemen) झालों ही भावना कॉलेजांत गेल्याबरोबर प्रसवून एक प्रकारची आढ्यता येत असेल खरी. पण तिनें खरा आध्यात्मिक-किंबहुना नुसता बौद्धिक लाभ घडत नाहीं हें माझ्या अनुभवास लवकरच येऊं लागलें. तें कसेंही असलें तरी आमच्या ह्या नवीन आढ्यतेची एक मौजेची गोष्ट आठवते; ती अशी-
मॅग्नाचार्टा
शेपन्नास मुलांची हजेरी रोज घेणें आवश्य होतें. कारण विश्वविद्यालयाच्या परीक्षेला बसण्यापूर्वीं अमूक दिवसांची हजेरी (टर्म) कॉलेजांत भरली आहे असा दाखला विद्यार्थ्याला विद्यालयास द्यावयाचा असतो. प्रोफेसराचा वेळ हजेरी घेण्यांत जाऊं नये म्हणून हें काम ह्या कॉलेजचे श्री. दिक्षित नांवाचे एक अनुभविक कारकून असत त्यांचेकडे असे. हे भले धिप्पाड गृहस्थ न्यू इंग्लिश स्कूलमध्यें ड्रिलही शिकवीत असत. त्यामुळें हें लष्करी कु-र्यांत हजेरी घेत. ह्यांचा आवाज दणकट व एकंदरीत चर्या उग्रट होती; आणि ह्या गोष्टीची जाणीव दुर्दैवानें त्यांच्यांत किंचीत वाजवीपेक्षां जास्त होती. म्हणून त्यांची वागणूक विद्यार्थ्यांशीं-विशेषतः बाहेरगांवच्या नवख्याशीं –थोडीशी चढेलपणाची व उर्मटपणाची होती. प्रत्येक विद्यार्थ्याचें नांव पुकारल्यावर विद्यार्थ्यांनीं Present Sir असें सभ्यपणाचें उत्तर द्यावयाचें असते. ही स्वारी विद्यार्थ्यांचें नांव पुकारतांना त्यांच्या मागें मिस्टर हे सभ्यतादर्शक उपपद लावण्याचा कंटाळा दाखवूं लागली. पण विद्यार्थ्यांना आपण सभ्य गृहस्थ आहोंत ही जाणीव होती. “मिस्टर” नांवामागें न ऐकूं आल्यास Sir (महाराज) हे Present (हजर) ह्या उत्तरापुढें लावण्याची ही सभ्य मंडळीं अर्थांतच टाळूं लागली. शेवटीं हें प्रकरण प्रिन्सिपॉलपर्यंत जाऊन ह्या ड्रिल (कवाईत) शिकविणा-या कारकूनजीला विद्यार्थ्यांच्या नांवामागें मिस्टर हे पद जरूर लावण्याचा धडा शिकावा लागला! आणि अशा प्रकारें आम्हां विद्यार्थ्यांनाही आम्ही सभ्य गृहस्थ आहोंत ह्याबद्दलचा मॅग्नाचार्टा-पुराव्याचा पट्टा-मिळाला!
लाजाळूवृत्ति
सभ्य गृहस्थपणाचें तिसरें लक्षण म्हणजे हायस्कूलप्रमाणें कॉलेजांत शिक्षकांपुढें ५।६ तास पोज डांबून बसण्याची आवश्यकता नव्हती. दोन तीन तास दोन तीन विषयांवर फार तर व्याख्याने ऐकलीं कीं, आम्ही सभ्य गृहस्थ झालों मोकळें! मग वाटल्यास पुस्तकांत डोकें खुपसून बसा, किंवा खेळाच्या मैदानांत बागडा किंवा गांवांतून उनाडक्या करा, कोणी कोणाला विचारणाराच नसें. सभ्यपणाच्या लक्षणांच्या एकाहून जास्त माळा इतराप्रमाणें माझ्याही गळ्यांत जरी पडल्या होत्या तरी मी कर्नाटकांतून नुकताच पुण्यासारख्या मिजासखोर शहरांत गेलेला गरीब खेडवळ विद्यार्थी, इतरासारखा व इतका एकदम कांहीं “सभ्य गृहस्थ” होण्याइतका धीट बनलों नाहीं. भेदरट, लाजाळू, अनोळखी असा मी सर्वांत मागच्या बाकांवर बसत असें. आणि ही संवय पुढें अनेक कारणांनीं शेवटपर्यंत कायम जडली. आमच्या कॉलेजचें त्यावेळीं विद्यार्थि वसतिगृह नव्हतें. तें पुढें १८९५ सालीं कॉलेजची स्वतःची इमारत चतुःशिंगीच्या माळावर उभारल्यावर झालें. आणि तें झाल्यावरही माझ्यामध्यें निरंतर सुख मानून वास करणा-या माझ्या दारिद्र्य मित्रानें तेथें राहाण्याची मला मनाई केली. अर्थात् मग मला शहरांत जेथें मिळेल तेथें माझ्या बि-हाडाची सोय करावी लागली.
पेंच-प्रसंग
मला स्कॉलरशिप तर अवघी दरमहा १० रुपयांची! प्रिन्सिपालनें माझ्या फी माफीचा अर्ज तर देखत हुकूम धुडकावून लावला. दरमहा ५ रुपये कॉलेजची फी; तीही सगळ्या टर्मची अगाऊ ३० रुपये भरावयाची होती. शिवाय कॉलेजची पुस्तकें व इतर उपकरणें घ्यावयाची होतीच. मग खोली भाड्याला व खाणावळीला काय उरणारॽ मी ही सर्व आवश्यक सोय कशी लावली ह्याचा उलगडा मला आतां किती आठवण करून पाहिले तरी सुचत नाहीं. मी त्यावेळीं काय केलें ते एक हरीच जाणें! विशेष पेंच हा कीं, ज्या आगरकर महाशयांनीं मला नादारी दिली नाहीं; त्यांच्या सुधारकांतील लेख वाचून माझी अलीकडे कित्येक दिवसापूर्वींपासूनच त्या हरीवरील श्रद्धाही बरीच कमी कमी होत आली होती. पण ज्याअर्थी मी जगून वाचून राहिलों आणि बी. ए. ; अर्धा एल. एल. बी. ही झालों त्या अर्थी ह्या सर्व सोयी झाल्या हें तर खासच. आणि ज्याअर्थी तुरुंगांत कधी गेलों नाहीं व आजारीही फारसा पडलों नाहीं त्याअर्थी मी कांहीं तरी उपाय केलें असावें. पण अशानें माझ्या वाचकांचें समाधान कसें होणारॽ ह्या प्रश्नामुळें आतां मी जो पेंचांत पडलों आहे तितका त्यावेळींही मी खास पडलों नाहीं. असो! वरील प्रश्नास उत्तर म्हणजे त्यावेळची स्वस्ताई आणि त्यापेक्षांही निखालस उत्तर म्हणजे गरजा आणि उणीवा सहन करण्याची माझी अपार तयारी. माझ्या आईबाबांनीं विशेषतः ही माझी तयारी सगळ्या आयुष्यभर पुरून मागें मुलांबाळांस लागल्यास उरेल इतकी केली होती. मी पुण्यास आल्याबरोबर जरी कॉलेजांतला “सभ्य गृहस्थ” बनलों नाहीं तरी कशीही वेळ आल्यास वर्ष अखेर परीक्षा उतरण्याची तयारी ठेविली.
तिघेजण
कोठून ओळख निघाली किंवा काढली तें कांहीं आतां आठवत नाहीं; पण लवकरच सदाशिव पेठेंतील ताडपत्रीकरांच्या वाड्यांतील ढेलजेंतील दोन खणांची एक खोली आम्हां तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांना भाडें कांहीं न पडतां राहावयास फुकट मिळाली. आणि जरी भाडें पडलें असलें तरी ह्या दोन खणांस तिघांमिळून दरमहा आठ आण्यांपलीकडे जास्त पडणें शक्यच नव्हतें! हे तिघे विद्यार्थी म्हणजे जनुभाऊ करंदीकर (रा. जनार्दन सखाराम करंदीकर), काशिनाथ पोंक्षे आणि मी स्वतः! ह्याच खोलींत केव्हां केव्हां अभ्यास करावयाला विशेषतः आम्हां सर्वांच्या आवडीचें वर्गांत लावलेलें इंग्रजी पुस्तक जेन ऑस्टिनची कादंबरी ‘प्राइड ॲन्ड प्रेज्युडीस’ हें आमच्याबरोबर वाचावयाला वाईचे केशव रामचंद्र कानिटकर, ‘फर्ग्युसन कॉलेज’चे भावी प्रसिद्ध प्रिन्सिपाल, हेही येत असत. बाहेरगांवचा (पुण्याचा नव्हे हो) हाच काय तो सोबती आणि मित्र आम्हां जमखंडीकरांना लाभला; आणि तो अद्यापि टिकला आहे. पण खुद्द पुण्याच्या एकाही विद्यार्थ्यानें अगर पुढें मोठा झाल्यावर गृहस्थानें आतांपर्यंत कोणीही आंगाशीं लावून घेतलें नाहीं. ह्याचें नांव पुणें!
कॉलेजखर्च
राहाण्याची सोय झाल्यावर अर्थात् खाणावळही पाहिलीच. दरमहा ५ रुपयांत, कदाचित ४॥ ही असतील, खाणावळ भागे. भात, चपाती, वरण, भाजी, तूप, साखर सर्व कांहीं बेतानें पण असेच. दूध नाहीं तरी पुण्याचें नमुनेदार पारदर्शक ताक तरी असेच! आंघोळीला पाणी पुण्यांतील तेव्हांच्या हौदांत गल्लोगल्लीं थंडगार मुबलक मिळे. वाटेल तितक्या बादल्या टाळक्यावर ओतून घेतल्या तरी कोणी विचारीत नसत. पाण्याच्या बाबतींत पुण्याइतका सुखी गांव त्यावेळीं सा-या जगांत कोठें नसेल! बाकीचा चिल्लर खर्च आम्ही तिघांमध्यें अगदीं गोडी गुलाबीनें सहज वाटून घेत असूं. एकंदरींत त्यावेळचा माझा कॉलेजचा खर्च हल्लींच्या माझ्या मुलाच्या हायस्कूलच्यापेक्षां निम्म्याहूनही कमी येत असावा. एरवी माझे शिक्षण झालेंच नसतें!
काटकसर
कॉलेजांत दरवर्षी दोन मोठ्या सुट्या होत्याच. त्यावेळीं घरीं येण्याजाण्याचा जो आगगाडीचा खर्च होई तो खाणावळीचा जो खर्च वाचे त्यांतून होई. कुडची स्टेशनावरून जमखंडीस जावयाला ३३ मैलांचा चांगला गाडीचा रस्ता आहे. कित्येक वेळां माझा सर्व बोजा घेऊन हा सर्व रस्ता मी पायींच केलेला मला नीट आठवत आहे. बैलगाडींत एका स्वारीला चार आण्यांपासून फार तर आठ आण्यांपर्यंत खर्च येई. तो वांचविण्यासाठीं मला हे ३३ मैल पायींच रखडावें लागे. आजची तरुण मंडळी मुंबईंत अर्धा मैल जावयाचें झाल्यास निदान एक आणा ट्रामला खर्चून वर दोन आण्यांचा चहा पितात. एवढ्यांतच हात आटोपले तरी त्यांना काटकसरी म्हणण्यास मीही तयार आहे! मला दरमहा दहा रुपयेप्रमाणें एक वर्षांत १२० रुपये स्कॉलरशिप मिळे. त्यांत साठ रुपये तर कॉलेजची फी झाली. बाकीच्या साठ रुपयांत जितके महिने पुण्यास राहत असें तितके ५ रु. तरी खाणावळीस द्यावे लागत. सुट्टींतले वाचलेले रुपये गांवीं जाण्यायेण्यास, खोलीभाड्यास आणि दिवाबत्ती, न्हावी, धोबी, बगैरे खर्चास आवश्यक असत. मग माझ्या कॉलेजच्या पुस्तकांला पैसे कोठून आणिले ह्याचा मला कांहींच थांग लागत नाहीं. जरुर तेवढींच पुस्तकें आमचीं स्वतःचीं निरनिराळीं असावींत; बाकीचीं कांहीं तिघांत मिळून होतीं. तरी एवढी जरूर तीं पुस्तकें मीं कशीं विकत घेतली असतील, मला आतां कांहींच आठवत नाहीं. मात्र मी ती त्यांचीं किंमत कोणापासून चोरली नव्हती येवढेंच स्पष्ट आठवतें. अशा कठीण कात्रींत माझी कॉलेजची पहिलीं तीन वर्षें म्हणजे इंटरमिजिएटची दुसरी परीक्षा होईपर्यंत मीं दिवस काढले कसे तें ईश्वर जाणे!
पैशांची टंचाई
असें माझें हें गाडें वर्षभर कसें तरी रेटलें. माझी प्रिलिमिनरी म्हणजे कॉलेजांतील पूर्वींची चांचणी परीक्षा पास झाली. अर्थात् मला मुंबईच्या विश्वविद्यालयांतील पहिल्या प्रीव्हियस परीक्षेला बसावयाचें होतें. त्या परीक्षेची फी २० रुपये होती. ती कोठून आणावयाची हा मोठा तातडीचा प्रश्न पडला. परीक्षेचा फॉर्म (अर्जाचा नमुना) भरण्याचे दिवस आले. पण वीस रुपये कांहीं मजजवळ येईनात. मी गांगरलों! वेळ कठीण आला. प्रीव्हीयसच्याही पूर्वींची एक अधिकच परीक्षा मजपुढें आली म्हणावयाची! शेवटीं हताश होऊन बसलों असतां एका गृहस्थानें एक विचार सुचविला. नरहरपंत नांवाचे एक गरीब ब्राह्मण गृहस्थ भटकीसाठीं ताडपत्रीकरांच्या वाड्यांत जात येत असत. त्यांचा व आम्हां विद्यार्थ्यांचा परिचय झाला होता. मी मराठा असून इतका शिकलों ह्याचें त्यांना कदाचित् कौतुक वाटत असावें. मी ह्या पेचांत पडलों असें पाहून त्यांनीं मला आपल्या रावबहादूर नवलकर नांवाच्या एका परभू सुधारक गृहस्थाकडे नेलें. त्यांनीं मला परीक्षेच्या फीकरितां दोन रुपये दिले व माझी फार निकडीची गरज आहे म्हणून मला ताबडतोब मदत करावी अशा अर्थाची एक चिठ्ठी, आपल्या कांहीं मित्रांचीं नांवें मला कळवून, त्यांना दाखविण्यासाठीं दिली. परंतु ही चिठ्ठी घेऊन इतक्या जणांकडे जाणें मला फारच अवघड वाटूं लागलें. एकतर हीं माणसें फार मोठमोठीं होतीं. आणि त्यांचे बंगले शोधून काढून त्यांच्यापुढें जाऊन उभा राहिलों तरी ते मला कसें वागवितील ह्याची मला फारच भीति वाटूं लागली. कारण अशा प्रकारच्या याचनेचा माझ्या आयुष्यांतला हा अगदीं पहिलाच प्रसंग होता. रावबहादूर नवलकरांच्या घरीं देखील मला रा. नरहरपंतांनींच बळेंबळें नेलें होतें. त्यांनींच मला भरीस भरवून रावबहादूर महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सरदार कुप्पुस्वामी मुदलियार, वकील राजन्ना लिंगो वगैरे मोठमोठ्या माणसांकडे पाठविलें. इतर कांहीं जणांकडे ही चिठ्ठी घेऊन उन्हातान्हांतून दीनवाणा होऊन फिरलों. पण त्या सर्वाचीं नांवें आतां आठवत नाहींत. रुपये सारे १४ च जमले. फी भरण्याची तर घाई अगदीं गळ्याला फांसासारखी लागली. अशा स्थितींत कधीं न विसरण्यासारखी गोष्ट घडली, ती अशी.
डॉ. शेळके
वरील चौदा रुपये जमविण्याकरितां मी ज्या गृहस्थांकडे गेलों त्यांत मराठा जातीचा कोणीच गृहस्थ नव्हता. प्रत्यक्ष म्हस्केसाहेबांकडे मी मुळींच गेलों नाहीं. कारण त्यांनीं आपल्या संस्थेंतून स्कॉलरशिप दिली, ह्याचेंच मला असह्य ओझें झालें होतें. फीला पुनः पैसे पाहिजेत हें दैन्य त्यांचेपुढें दाखविण्याचें धैर्य मला मुळींच होईना. सबंध वर्षभर मी जे काटकसरीचे हाल सोसले त्यापायीं मदत मागण्यास जर मी त्यांचेकडे कधींच गेलों नाहीं तर मग आतां तरी कसें जावयाचें! शेवटीं नरहरपंतांनीं डॉ. शेळके नांवाच्या एका मराठा जातीच्या गृहस्थाच्या घरीं जाण्याचा आग्रह केला. शुक्रवार पेठेंत बाळंत स्त्रियांसाठीं जो दवाखाना आतां आहे तेथें पूर्वीं म्युनिसिपालिटीचा एक दवाखाना होता. त्यांत शेळके हे डॉक्टर होते. हे मूळचे कोल्हापूरचे. तेथें त्यांचें एक घर आहे. ह्यांचेपुढें मी नवलकरांची चिठ्ठी ठेवल्याबरोबर त्यांनीं जें मला खरपूस तासडलें तें मला आमरण आठवील! “मराठ्यांच्या कुळांत जन्मून असें हें भिक्षापात्र फिरविण्याची तुला लाज वाटत नाहींॽ जवळ पैसे नसल्यास गुरें राखावींत. कशास शिकावेंॽ...” वगैरे वगैरे. ती चिठीच नव्हे तर मजजवळचे १४ रुपयेही ह्या मराठा जमदग्नीपुढें ठेवून तेथून निसटावें असें मला झालें. अंगाला माझ्या घाम आला. असो.
सौ. बहिणाबाई
बाकीचे ६ रुपये आणि मुंबईला जाण्याचा खर्च ह्याबद्दल मला जी अनपेक्षित मदत झाली ती अशी – तेरदाळचे रा. विष्णुपंत देशपांडे हे माझे अत्यंत जिवलग बाळमित्र. माझ्यावर आलेली ही अडचण त्यांच्या लक्षांत आली. ते घरचे जरी श्रीमंत होते तरी ते स्वतः वयांत न आल्यानें त्यांचे हातीं पैसे खेळत नव्हते. त्यामुळें त्यांना तळमळ लागली. त्यांची प्रेमळ पत्नी सौ. बहिणाबाई यांना ही तळमळ पाहवेना. त्यांनीं आपल्या माहेरांकडून दिवाळीतील भाऊबीजेच्या ओवाळणींत मिळालेले २० रुपये रा. विष्णुपंतांमार्फत मला पोंचविले. जुन्या वळणांतील ही साध्वी बाई आपल्या नव-याचा मी मोठा भाऊ असें समजून मजसमोर अद्यापि कधींही उभी राहिली नाहीं. असा हा ख-या कळकळीचा अपूर्व मासला होता. मात्र ह्यापुढें मी स्वतःसाठीं कोणापुढें अशी भीक कधींच मागितली नाहीं. तरी आतांपर्यंत माझा व माझ्यावर अवलंबून असलेल्यांचा योगक्षेम चालला ह्याचें श्रेय डॉ. शेळके ह्यांनाच मला देणें बरें वाटतें! परोपकारासाठीं पुढें लाखो रुपये जमविण्याची पात्रता व इच्छा मला आली. ह्यांतही कदाचित् डॉ. शेळके ह्यांचाच हा विरोधी आशीर्वाद कारण झाला असेल, नसेल कशावरूनॽ आमच्या वेळेला, आतांप्रमाणें, प्रिव्हीयसची परीक्षा कॉलेजांत घेत नसत. तिचेसाठीं आम्हांला मुंबईलाच जावें लागलें. त्या निमित्तानें मला ह्या मोहमई ऊर्फ मुंबईचें प्रथम दर्शन घडलें. ह्या प्रथम दर्शनाचा परिणाम मुळींच अनुकूल नव्हता. ह्याचें एक कारण आम्ही अगदीं ऐन परीक्षेच्या वेळींच मुंबईस आलों आणि जागेपणाचे बहुतेक तास अभ्यासांत किंवा परीक्षेचे पेपर्स लिहिण्यांतच जात. त्याशिवाय मुंबईची कोंडलेली गर्दीची वस्ती, समुद्र कांठची घामट हवा, मुंबईच्या लोकांचा आत्मशून्य वरपांगी स्वभाव इत्यादि अनेक कारणें होतीं. कांदेवाडींत खत्रे यांच्या चाळींत दोन खणाचे एका खोलींत आम्ही कांहींजणांनीं जागा घेतली. त्यावेळीं ह्या दोन खणांला चार रुपये भाडें पडलें. तें आम्हांला किती जास्त वाटलें! पण आतां त्याच जागेला १२ रु. पेक्षां जास्त भाडें पडत असावें. रात्रंदिवस जागून कशीतरी परीक्षा देऊन मी फार वेळ न दवडितां सुट्टींत जमखंडीस गेलों. परीक्षेंत पास झाल्याचा निकाल जमखंडीस समजला. माझ्यापेक्षां माझ्या आईबाबांनाच फार आनंद झाला!
मृदुना दारुणं हंति मृदुना हंत्यदारुणम् ।
नासाध्यं मृदुना किंचित् तस्मात्तीव्रतरं मृदु ॥३२॥
—वनपर्व २८ अध्याय.
धर्म —द्रौपदी संवादांतील बळी आणि प्रल्हाद ह्यांच्या संवादांत, प्रल्हाद आपला नातू बळी ह्याला म्हणतो :— ''मऊपणा (दये) नें कठिणाला जिंकतां येतें; मऊपणानें अकठिणाला तर जिंकितां येतेंच. मऊपणाला असाध्य असें कांहींच नाहीं. म्हणून मऊ (दया) हें तीक्ष्णाहूनही अधिक तीक्ष्ण होय !''
आतां मी सत्तराचें घरांत जाऊं लागलों आहें. जगाच्या दोन पिढ्या तर माझ्या पाहून झाल्या. तिसरी किती पाहीन तें भविष्य मात्र जाणें. माझ्या आयुष्याचें सार जर काढावयाचें असेल, तर महाभारतकारांनीं प्रल्हादाच्या तोंडीं जो उद्गार घातला आहे, तोंच सार माझ्या आयुष्यांतील अनुभवाचा आहे. महात्मा गांधी ह्यांच्या अहिंसावादाची ही तन्मात्राच होय. असा कठीण अनुभव मला कळूं लागल्यापासून — निदान माझ्या सार्वजनिक कामांत तरी मला पदोपदीं आला. ह्यावरून मी स्वभावतः मृदु आहें, असें सांगण्याचा माझा हेतु नाहीं. जी वस्तुस्थिति नाहीं ती आहे असें मी कसें सांगूं ? तसें मी म्हणेन तर पुढें ज्या आठवणी व अनुभव मीं लिहिले आहेत, तीं सर्व असत्यमिश्र आणि म्हणून कवडी मोल ठरतील. माझा जन्म — स्वभाव मृदु नसून कठीण होता. दारुण नसला तरी कठीण होता हें खरें. निदान वरील श्लोकांतल्याप्रमाणें मृदु तरी नव्हताच हें खास. पण माझ्या आयुष्यांत विशेषतः माझ्या प्रौढपणांत जीं जीं कामें मीं केलीं, सत्याचीं, धर्माची आणि निर्मळ प्रेमाचीं म्हणून त्यांची धुरा माझ्या दुर्बल खांद्यावर घेतली त्यांत मला कठीण अनुभव आला ! त्यामुळें आतां मी पूर्णपणें नाहीं तरी अंशतः बराच मऊ झालों आहें. आणि ह्यांत माझ्या सेवेचें फळ मला मिळालें, असें समजून मी जगच्चालकाचाच नव्हे तर जगाचाही आभारी आहें.
माझ्या कामांत मला यश मिळालें नाहीं म्हणून मला कठीण अनुभव आला असें नव्हे. यशाची मला आकांक्षाच नव्हती. यशाची मला नीट व्याख्याच करितां येत नाहीं तर मी त्याची इच्छा तरी कशी करूं ? माझ्या कामांत माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठीं मी घरदारही कमी समजून तीं तीं कामें करीत होतों, त्यांचाही माझ्यासंबंधीं गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधही झाला. हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय. ह्यामुळें माझ्या मनाची शांति ढासळली आणि अकालीं बहुतेक स्वीकृत कामांतून मी विराम पावलों. मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामांतून मी विराम पावणें शक्यच नाहीं; कारण मी धर्माचा स्वीकार केला हें खरें नसून, धर्मानेंच माझा स्वीकार केला, अशी माझी समजूत असल्यामुळें ह्या शरीरांतून विराम पावेपर्यंत तरी धर्मानें मला पछाडलें आहेच व पुढेंही तो मला अंतरणार नाहीं, ही मला आशा आहे.
माझ्या अनुभवांतून मी वाचलों आहें व मला निर्वाण जरी नाहीं तरी मनाला थोडीबहुत अलीकडे शांति मिळत आहे. कारण मी मृदु होऊं लागलों हेंच होय. माझीं कामें कठीणपणानें होण्यासारखीं नव्हतींच. पण मीं जर प्रथमपासूनच मृदुपणानें हीं सर्व कामें केलीं असतीं तर इतके कठीण अनुभव आले नसते, ते स्वभावदोषामुळें आले. त्या सर्वांतून मी पार पडलों ह्याचें कारण मी माझ्या कामामुळें मृदुतेचे धडे — मला कळत, किंबहुना नकळतही— शिकलों हें खास. जी मृदुता माझ्यामध्यें स्वभावतः नव्हती, केवळ कामामुळें आली, ती माझ्या आईमध्यें मूर्तिमंत होती; आणि तिच्याद्वारें ती मजमध्यें मला नकळत कां होईना आली होती. येरवीं तिचे धडे मी कामामुळें तरी शिकण्यास कसा पात्र झालों असतों ? ह्याप्रमाणें ह्या विश्रांतीच्या गेल्या ७ वर्षांत माझें लक्ष माझ्या पूर्वजांच्या चरित्राकडे गेलें.
माझ्या कांहीं पक्षपाती मित्रांनीं मला स्वतःचें चरित्र लिहिण्याची सूचना व आग्रह बराच वेळा केला होता. पण तशी माझी पात्रता व लौकिक दृष्ट्या जरूरी मला वाटेना. जगांत ग्रंथ — प्रकाशनाचें काम आतां इतकें बेसुमार वाढलें आहे कीं त्यांत आणखी एका गबाळ ग्रंथाची भर टाकण्याचें धैर्य मला अद्यापि येत नाहीं. असो.
ह्या इ. स. १९३० वर्षी चालूं झालेल्या भारतीय धर्मयुद्धांत मी कसाबसा पडलों. तो तपशील सांगण्याचें हें स्थळ नव्हे. शेवटीं त्याचें फळ म्हणून माझ्या सुदैवानें ता. १२ मे १९३० सोमवारीं सायंकाळीं ७ वाजतां मी येरवड्याच्या तुरुंगांत जाऊन पडलों. तेथें मी सुखी होतों. ज्या दिवशीं मी तेथें गेलों त्या दिवशीं वैशाख पौर्णिमा— श्रीगौतमबुद्धजयन्ति—होती ! ह्या सुमुहूर्तावर मी ह्या शांती मंदिरांत आलों. मला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा मिळाली होती. रोज ८ तास काथ्या वळण्याचें काम करावें लागलें. त्यामुळें माझी प्रकृति बरी होऊन माझी खरी कुरकुर कांहींच उरली नाहीं. पण सायंकाळीं अंधार्या खोलींत कोंडल्यावर दुसरे दिवशीं सकाळीं पुनः कामासाठीं दार उघडेतोंपर्यंत माझा वेळ जात नव्हता. मी लिहिण्याचें सामान घरून मागितलें. रात्रीं दिवा असेल अशा खोलींत मला कोंडण्याची विनंती केली. पण हें सर्व होण्यास २॥ महिने गेले ! केवळ माझ्या करमणुकीसाठीं म्हणून मी ह्या माझ्या आयुष्यांतील ''आठवणी व अनुभव'' तुरुंगांतील खोलींत लिहिल्या आहेत. बोध तर दूरच राहो, पण नुसती करमणूकही इतरांची होईल, असें मला वाटत नाहीं. तसा माझा हेतूच नाहीं.
पुढील प्रकरणें म्हणजे माझीं केवळ असबंद्ध टिपणें आहेत. विशेष माझ्या पूज्य मातापितरांचें व इतर पूर्वजांचें पुण्यस्मरण ह्या एकांतवासांत व्हावें, व मनाची लाडकी हळहळ मिटावी म्हणून मी लिहिण्यास सुरुवात केली. पुढें पुढें माझ्या केवळ आठवणीपेक्षां माझ्या लहानपणींच्या अनुभवाचे महत्त्व चरित्रशास्त्राच्या दृष्टीनें मला भासूं लागलें म्हणून माझे चरित्राच्या गोष्टी लिहूं लागलों. आतां ह्या लेखाचें तारूं कोणीकडे भडकतें आणि कोणत्या बंदराला पोचतें— कां मध्येंच लहरीच्या वार्यावर हेलकावे खात एकाद्या खडकावर आपटते ह्या पुढच्या गोष्टी. तोंपर्यंत प्रस्तावनाही येथेंच पुरें करणें बरें नव्हे ?
''यल्लभसे निजकर्मोपात्तं । वित्तं तेन विनोदय चित्तं ॥''
वि. रा. शिन्दे
रामविहार, १२९२ शिवाजी नगर, पुणें ५.
ता. २३ एप्रिल, १९४०
प्रकरण १८ वें
प्रस्ताव
हायस्कूलचा काळ इ. स. १८९१ अखेर माझ्या वयाचीं आठरा वर्षें म्हणजे माझें पोरवयच म्हणावयाला हरकत नाहीं. तेथपर्यंत माझा अभ्यास, खेळ, खोड्या, सोबत्यांचा सहवास व माझा एकांत वास वगैरे गोष्टी उघडपणें मीं सांगितल्या. आतां जी धर्मभावनांची आठवण सांगणार आहें तो विषय गंभीर आहे इतकेंच नव्हे तर तो माझ्या चरित्रांतला आत्मा आहे. धर्मानें माझ्या आयुष्याचा प्रवाह-निदान त्याची दिशा तरी-पुढें पार बदलली. अशा महत्त्वाच्या विषयासंबंधी लिहिण्यापूर्वीं धर्माविषयीं माझी दृष्टि कशी आहे तें सांगणें जरूर आहे. मी केवळ आठवणी व मागील अनुभव लिहित असतां मध्येंच माझी आतांची दृष्टि किंवा विचार देणें अगंतुक विषयांतर आहे, हें मला कबूल आहे. पण माझी दृष्टि समजल्याशिवाय मी धर्माविषयीं जें लिहीन तें वाचकांस न समजतां कदाचित गैरसमज होण्याचा संभव आहे. म्हणून हे किंचित् विषयांतर क्षम्य आहे असें मला वाटतें. इतर गोष्टी वेगळ्या आणि धर्म ही बाब वेगळी अशी पुष्कळ सूज्ञांचीही समज असते. पण इतर गोष्टींप्रमाणेंच मनुष्यमात्रांत धर्माची जी उपजत बुद्धि आढळते तीही परिणति व विकासाचाच विषय आहे असें मला वाटतें. म्हणजे तीही नैसर्गिक नियमांना अनुसरूनच उपजते, वाढते आणि कदाचित् लयही पावते. खाणें, पिणें, वाचन, अभ्यास, मैत्री, वैर, खेळ, खोड्या, संपत्ति, विपत्ति वगैरे गोष्टी केवळ निसर्गाच्या नियमांप्रमाणें घडतात. त्यांना कांहीं ईश्वरी प्रसादाची किंवा प्रेरणेची गरज नाहीं. मात्र धर्माच्या जागृतीला आणि वाढीलाच काय ती ईश्वरी कृत्याची जरूरी आहे, असें मला वाटत नाहीं. अशी जरूरी माझ्या धर्मबुद्धीला असेल तर ती माझ्या पाळण्यांतल्या खेळांला आणि पोरकट खोड्यांना कां नसावीॽ मीं जें बरें केलें असेन, तेवढीच नेमकी ईश्वरी कृपा आणि वाईट किंबहुना बरेंही नव्हेत आणि वाईट नव्हेत अशा सर्व एरवी मामुली गोष्टींला मात्र मीच जबाबदार, असें माझें मत नाहीं. तर असें भोळसर मत सर्वज्ञ परमेश्वराचें कोठून असणारॽ आपल्या चारित्र्याबद्दल व्यक्तीच सर्वस्वी जबाबदार असेंही माझें म्हणणें नाहीं. जशी व्यक्ति जबाबदार आहे तसाच त्या व्यक्तीचा अनुवंश (पूर्वपरंपरा) आणि परिस्थिति (हिच्यांतच त्या व्यक्तीचें शिक्षण, नातलग, स्नेही, वैरी वगैरे सर्वच नैसर्गिक बाबींचा समावेश होतो.) ह्याही गोष्टी जबाबदार आहेत. एकूण मनुष्याच्या चारित्र्याबद्दल व्यक्ति आणि निसर्ग हीं दोनच कारणें पुरीं असून, ईश्वराला त्यामध्यें खेचणें अनावश्यक दिसतें. असो. ह्यापेक्षां जास्ती खोल विचारांत शिरण्याचें हें स्थळ नव्हे. दांडगाई, मारामारी आणि माझ्या दुष्ट खोड्यांच्या आठवणी ज्या लेखणीनें आणि ज्या ओघांत लिहिल्या त्याच लेखणीनें आणि ओघांत मी माझ्या धर्माचाही विषय लिहितों हें पाहून कोणा वाचकाचें कोंवळें मन प्रथमच बिचकूं नये; आणि पुढेंही ज्या सहज आणि मोकळ्या मनानें माझीं व्यंगें सांगितलीं तशाच मोकळेपणानें माझ्या धार्मिक भावनांचा अहवाल मी सांगत आहें हें वाचून कोणाच्या कोंवळ्या विचारांना धक्का लागूं नये म्हणून मध्येंच ही थोडी प्रस्तावना केली आहे.
स्पष्टोक्ति
शिमग्यांतल्या माझ्या ९।१० वर्षांच्या वयांतल्या अश्लील लीला वाचून किंबहुना १४।१५ वर्षांच्या वयांत जुन्या श्रृंगारिक कादंब-या वाचून हुरळलेल्या माझ्या मनाला, “कारंज्याचे तुषार वाटती अग्निकणाचे परी” हा भपकेदार अनुभव आला; अशी माझी स्वतःचीच जबानी वाचून कोणी सूज्ञ वाचक, मी त्यावेळीं मोठा बदफैली होतों असें अनुमान काढणार नाहीं. त्याचप्रमाणें पुढें ज्या मी माझ्या पोर धर्माच्या कहाण्या सांगणार आहें त्या वाचून मी जन्मसिद्ध संत-शिरोमणी होतों, असेंही कोणी अनुमान काढण्याचें कारण नाहीं हें उघडच आहे! कच्च्या दिलाच्या, अर्धवट विचाराच्या व पक्षपाति वाचकांसाठीं माझ्या आठवणी मुळींच नाहींत हें सर्वांनीं ध्यानांत ठेवावे.
बागुलबोवा
धर्म हा विषय बुद्धीपेक्षां भावनेचा अधिक असल्यानें, आणि तो विकासशीलही असल्यानें मी ह्या बाबतींतील माझ्या आठवणींना अगदीं माझ्या पाळण्यांपासून सुरवात करितों. मी-तान्हें बालक असतांना-ज्या पाळण्यांत उताणा निजत असें तो पाळणा आमच्या घरच्या सोप्यांत टांगलेला असे. साधारणपणें पाळण्यावर कांहीं खेळणीं अगर भपकेदार, रंगीबेरंगी, बेगडी झिळमिळ्या बांधण्याचा मातांना शोक असतो. माझ्या पाळण्यावर तसलें कांहीं बांधलेलें आठवत नाहीं. निदान आठवण राहील अशा वयांत तरी कांहीं नव्हतें. पण माझें लक्ष पडल्यापडल्या वरच्या छताकडे जाई. नेमकें पाळण्याच्या वरती असलेल्या एका वेळूला एक चमत्कारिक गांठ होती. तिच्याकडे मी नेहमी निरखून पाही. ती मला एका दाढीवाल्या बोवाच्या मुखवट्याप्रमाणें भासे. मी माझ्या आईचें अंगाईचें गाणें ऐकूनही लवकर निजलों नाहीं आणि कामाखालीं बेजार झालेल्या आईला तर मला निजवावयाची घाई झाली म्हणजे शेवटीं आईनें मला बागुलबोवाची भीति घालावी. इकडे आईनें केलेला बागुलबोवाचा उल्लेख आणि वरती ह्या वेळूच्या गाठींत दिसणा-या बुवाची माझी दृष्टादृष्ट एक झाली म्हणजे माझा लय त्याच्याकडे विशेषच लागे आणि माझें रडणें थांबे. कारण ही वेळूची गांठ म्हणजेच बागुलबोवा अशी भीति आणि आश्चर्य ह्या भावनांनीं मिसळलेली माझी कोंवळी समजूत होऊन माझा वर लय लागे! मी निजलों असें समजून आई कामाला जाई. पण मी इकडे जागाच असें. ह्या वेळीं मी फार तर २।—२॥ वर्षांचा असेन. ही माझ्या आयुष्यांतील अगदींच पहिली आठवण!
पहिली धर्मभावना
पुढें वर्ष सहा महिन्यांनीं मी किंचित् बोबडें बोलूं लागल्यावर त्या वेळूच्या गाठीकडे बोट दाखवून तो पाहा बागूलबुवा तोच कायॽ असे मीं आईला विचारीही व ती हासून होय म्हणे! पण हें बागुलबोवाचेंच नव्हे तर माझ्या पहिल्या देवाचें दर्शन होय, हें मला आतां कळतें. तेव्हां मलाच माझें मन कळत नव्हतें तर तें माझ्या साध्या भोळ्या आईला कोठून कळणारॽ माझाच नव्हे तर अखिल मानव जातीचाही पहिला देव बागुलबुवाच असतो, हें मला पुढें ऑक्सफर्ड विश्वविद्यालयांतील मँचेस्टर कॉलेजांत तुलनात्मक धर्माच्या अभ्यासानें कळलें. व्यक्तींत असो किंवा मानव जातींत असो धर्मविकासाच्या पाय-या जवळजवळ त्याच आहेत, ह्या सिद्धान्ताला माझी ही बाळआठवण किती पोषक आहे ! Fear of God is the beginning of all knowledge ह्या बायबलांतल्या जुन्या करारांतील म्हणीलाही माझी आठवणच जोराची साक्ष देते. मात्र ह्या नव्या बागुलबुवाचा प्रथम परिचय घडतांना मनामध्यें केवळ भीतिच वाटत नसून, भीति थोडी पण आश्चर्य जास्त अशी कांहींशीं मिश्र भावना नवीनच उत्पन्न होत होती. काहीं असो तीच माझी पहिली धर्मभावना होय!
धर्माची गोडी
ह्या पुढील चार वर्षांत म्हणजे मी सात वर्षांचा होईपर्यंत आमचे घरांतल्या कुळाचारांत आणि विधि संस्कारांत देवापेक्षां देवी उपासनेचें प्राबल्य अधिक असे. माझे आजोबा बसवंतराव विशेष धार्मिक नव्हते. संताबाई ही माझी आजीच धर्मकृत्यांत पुढाकार घेत असे. आमचे घरीं नवरात्राचा सण आणि सोहळा सर्वांत मोठा होत असे. नवरात्रांत माझी आजी नऊ दिवस उपास करीत असे. केवळ फळावर, तेही थोडीं केळीं खाऊन ती असे. तिचें मुख्य दैवत श्री यल्लमादेवी हिचें वर्णन मागें आलें आहेच. तुळजापूरची अंबाबाई माझ्या आजोबांची व यल्लामा ही माझ्या आजीची. वस्तुतः पहिलीपेक्षां दुसरी मला अधिक पसंत असण्याचें कांहीं कारण नाहीं. असलेंच तर आजीचा पुढाकार येवढेंच. जितका गाजावाजा अधिक किंवा जितकें गोड खावयाला ज्याच्या पुजेंत अधिक मिळेल तितके तें दैवत लहान मुलाला अधिक प्रिय हा नियम निसर्गसिद्धच आहे. वैदिक देवतांत इंद्र अधिक प्रिय आणि प्रबल कां तर तो दारू अधिक पीत असे म्हणून. ती इंद्रालाही प्रिय अशी समजूत रूढ झाली असावी. ह्या न्यायानें मला ही यल्लाम्मा ५।६ वर्षांपासून प्रिय झाली. मनावरचा हा संस्कार मी पुढें इंग्रजी पांचव्या यत्तेंत असतांनाही कसा मला जाणवला हे मीं मागें सांगितलें आहे.
ताईबाईचें प्रस्थ
आमच्या देव्हा-यावर आणि नवरात्राच्या पूजेंत तुळजापूरच्या अंबाबाईच चित्र आणि आरत्या अधिक येते. ह्याचें कारण श्रीयल्लमा ही कानडी देवता आणि तिची उपासना अधिक ग्राम्यपणाची. आमचे घरचे पुरोहित तम्मण भटजी डेंगरे ह्यांना अंबाबाईच्याच मराठी व कानडी आरत्या येत असत. पण सौंदत्तीपेक्षां तुळजापूर अधिक लांब. आणि जमखंडीस अंबाबाईचे देवळापेक्षां श्रीयल्लामाचेंच देऊळ अधिक प्रसिद्ध शिवाय आणि माझ्या आजीचा करारीपणा जास्त. म्हणून ती जिवंत असे तोंपर्यंत माझ्या बाबांनीं पुढें सुरू केलेल्या ब्राह्मणी संस्कृतीला विशेष बळ आलें नाहीं. इतकेंच नव्हे तर देव्हा-यावरच्या श्रीयल्लामापेक्षांही बाहेर गोठ्यांतील कोनाड्यांत बसलेली ताईबाई हिंचे प्रस्थ वर्षांतून एक दिवस इतकें माजे कीं आम्ही सर्वजण त्या दिवशीं अगदीं हैराण होऊन जात असूं. आम्ही सर्वजण शाकाहारी असूनही केवळ नवसासाठीं म्हणून ह्या ग्राम्य ताईबाईची, एक गाभण मेंढी कापून आजीला कंदुरी करावी लागत असे. आमचे आजोबा जरी मोठे भाविक नव्हते तरी तेच एकटा मांसाहारी असल्यामुळें ताईबाईची ही पूजा त्यांच्या पथ्यावर पडे. आजाआजीचें सर्व ठीक झालें, तरी मला हें काय गौडबंगाल चाले तें कळत नसे! तें कसेंहि असो, यल्लामामुळें माझ्या मनावर अनुकूल परिणाम होत तर ताईबाईकडे पाहून प्रतिकूल ठसे उमटत!
सूडाची कल्पना
मी लहानपणीं इतका खोडकर होतों तरी फार कनवाळू होतों. ह्या ताईबाईला बळी देण्यास आणिलेल्या गाभण मेंढीची मला मोठी कीव येत असे. पण माझा इलाज तो काय चालणारॽ माझ्या देखत त्या बिचा-या जिवाचा घात झालेला पाहून मला ह्या ताईबाईचा मोठा राग येत असे. तरी दुसरे दिवशीं इतर देवाबरोबर तिचीही पूजा मला मुकाट्यानें करावी लागत असे. ह्या ताईबाईचें उणें पुरें करण्याचा मार्ग जरी नव्हता तरी तिचा सूड उगविण्याची मला दुसरी एक चमत्कारिक संधि मिळत असे ती अशी. आमच्या वाड्याच्या महाद्वाराच्या बाहेर दाराशीं लागून दोन्हीं बाजूंस दोन तिकोनी दगड ठेविले असत. त्यांना चुना लावलेला असे. प्रसंगविशेषीं त्यांना हळद, कुंकूंही लागत असे. ह्या दोन द्वारपालक देवताच असत म्हणावयाच्या. दिसण्यांत आकृतीनें हे दगड ताईबाईप्रमाणें आणि तेवढेच असत. मला वाटे हे ताईबाईचे कोणीतरी नातलग आहेत. त्या दुष्ट ताईबाईवरचा राग मी केव्हां केव्हां त्या बिचा-या बाहेर ठेविलेल्या दगडांवर मनमुराद काढून घेत असे. त्यांना एकमेकांवर चांगलें ठेचून काढीत असें. त्यांना उलटे ठेवी, पालथे पाडी; पण कांहीं केलें तरी मेलेली मेंढी पुनः थोडीच जिवंत होणार होतीॽ मारमारून माझेच हात दुखरे झाले म्हणजे मला हा खुळा नाद सोडावा लागे.
यथासांग पूजा
ह्या ताईबाईसारखीच आमच्या वाड्याच्या अगदीं बाहेरच्या आंगणांतील वायव्येकडील एका पडक्या खोलींतील खांबाचीही मला लहानपणीं पूजा करावी लागत असे. हें रमाबाई नांवाच्या एका मृत बाईचें भूत होतें. येणेंप्रमाणें आमचे घरीं माणसापेक्षां देव देवतांची गर्दी फार मोठी जमली होती. नवरात्रांत, गणेशचतुर्थीत वगैरे महापूजेचा प्रसंग आला म्हणजे देवघरांतील देव्हा-यावरील खंडोगणती टाकांची व मूर्तीची पूजा झाल्यावर, मग उतरंडीच्या डे-यांची (गाडग्यांची) नंतर देव्हा-यासमोरच्या कोनाड्यांत ठेवलेल्या लाकडी पादुकांची, जवळच्या खिडकींत रचून ठेवलेल्या सर्व पोथ्यांची, स्वयंपाकघरांत येऊन ताक करण्यासाठीं रोवलेल्या खांबाची, सोप्यांतील मुख्य कोनाड्यांत बसविलेल्या गणपतीची, गोठ्यांत बसलेल्या ताईबाईची आणि शेवटीं अगदीं बाहेर पायखान्याजवळील खोलींतील वर सांगितलेल्या खांबाची ऊर्फ भूताची अनुक्रमें पूजा करावी लागत असे. ही पूजा म्हणजे ताम्हणांतून नेलेल्या पाणी, गंध, अक्षता, फुलें वगैरेंनीं करावयाची असे. शिवाय हें झाल्यावर धुपारती, दीपारती आणि कापुरारती ओवाळायला पुनः ह्या इतक्या देवतांसमोर यावें लागे. ही आरती ओवाळतांना उजव्या हातानें आरती ओवाळणें आणि डाव्या हातानें घंटा वाजविणें ही कसरत एकाच वेळीं करावी लागत असे. आणि पुष्कळवेळां - विशेषतः गोड नैवेद्यामुळें, अगर शाळेला सुटीं असल्यामुळें मी खुषींत असलों तर - ही सर्व पूजा यथासांग करणें मला आवडतही असे.
मारुतीची पूजा
मराठी चौथ्या पांचव्या यत्तेंत असतांना बाबांनीं घरचें पूजारीपण मजकडेच दिलें होतें. ह्या मूर्तीपूजेंत माझें मन जरी केव्हां केव्हां रमत असे तरी रोज रोज हें सर्व नियमानें करण्याचें लचांड मागें लागल्यामुळें मी बहुतेक फार कंटाळत असे. ह्याचें कारण असें कीं आमची मराठी शाळा सकाळीं ७ पासून १० पर्यंत आणि पुनः दोन प्रहरीं २ पासून ५ पर्यंत असे. उन्हाळ्याचे दिवसांत सकाळीं शाळेंतून आल्यावर कडकडीत भूक लागलेली असायची. तरी पण मला आंघोळ करून सोंवळ्यानें ही सर्व पूजा करावी लागे. इतकेंच नव्हे तर घरांतील सर्व पूजा आटोपल्यावर मग गांवच्या मारूतीचे देवळांत जाऊन त्याची पूजा करून यावें लागे. मारुतीला जातांना सोंवळ्यानें जावें लागे. स्नान करून अंगाला व कपाळाला गंध लावून उजव्या हातांत पळी - पंचपात्री त्यांत पाणी, फुलें, तिचें बाजूला गंधाचा मोठा गोळा लावलेला, डाव्या खाकेंत धुतलेल्या उपरण्याची घडी अशा थाटानें आमची वामनमूर्ति मारुतीला निघावयाची. सुमारें ११।१२ वाजतां उन्हाळ्यांतलें तें कर्नाटकी ऊन पडे, पण अनवाणींच जावें लागे. मारुतीचें देऊळ बरोबर बाजारांत आमच्या हायस्कुलासमोरच होतें. तेथून आल्यावर मारुतीचें तीर्थ घरीं सर्व मंडळींना पळी पळीभर द्यावें लागत असे. हें एक माझी पूजेची हजेरी लावण्याचें साधन बाबांनीं करून ठेविलें होतें! इतकें झाल्याशिवाय मला जेवायला मिळत नसे. पूजेला ब्राह्मण ठेवल्यास कोठल्याही देवस्थानांत त्याला चमचमीत नैवेद्याचें खावयाला आणि वर भरपूर दक्षिणा असे. पण मला मात्र इतकें सारें करून जेवतांना नुसती कोरडी भाकर, तुरीची पातळ डाळ आणि तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी ह्याशिवाय कांहीं मिळत नसे. चटणीवर तेलही मिळावयाची मारामार! मग माझ्या कोवळ्या मनावर ह्या पूजेचा काय परिणाम होत असेल बरेंॽ
गाड्याची पूजा
अर्थात् मला ह्या सर्व पासरीभर देवांचा केव्हां केव्हां भारी राग येत असे. पूजा करीत असतां सगळे देव माझ्या हातींच येत. जे दगडाचे कठीण असत ते वाचत. पण जे सोन्यारुप्याचे नाजूक टाक असत त्यांना मी धरधरून वाकवीत असें आणि पुनः बाबांनीं पाहूं नये म्हणून सरळ करून ठेवी. घाई झाली म्हणजे दुरूनच त्यांच्यावर पाणी फेकून भिजवीत असें. घरांतल्या देवांचा असा झटपट संक्षिप्त समाचार घेतल्यावर मारुतीचीही तशीच वाट लागावयाची. घरांतून निघतांना पंचपात्री, गंध, फुलें, अक्षता सर्व श्रृंगार थाटाचा असावयाचा, पण पोटांत कावळे चावूं लागल्यावर कोण मारुतीपर्यंत जातोॽ आमचें मोठे आंगण ओलांडल्यावर बाहेर रस्त्यांत लगेच म्हातारबा नावांचे माझ्या बाबांचे एक सुतार मित्र होते; त्यांच्या मालकीचा सुतारी कारखाना लागत असे. त्यांच्याकडे दुरुस्तीला आलेल्या खटारगाड्या रस्त्यांतच उभ्या असावयाच्या. त्यांपैकीं एकाद्या गाडीच्या चाकाच्या गड्डयाची पूजा करून मी घरीं तीर्थ द्यावयाला येत असें. पण माझी ही चोरी फार दिवस न लागतांच उघडकीला आली. म्हातारबा वरचेवर बाबांना भेटावयाला येत असत. ते म्हणत, “रामा (माझ्या बाबांपेक्षा ते बरेच वयानें वडील असल्यानें ते अशी एकेरी हाक मारीत) आमच्या रस्त्यांत उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकांवरून अलीकडे बरेच दिवस पाणी, गंध, फुले, अक्षता आढळतात. हा काय चमत्कार!” बाबांनाही हें काय गौडबंगाल आहे पाहावेसें वाटल्यावरून ते पाहवयास गेले. पाहतात तों आपल्या घरचा गंध व फुलें नित्याचीं त्यांच्या ओळखीचीं दिसलीं. घरीं येऊन त्यांनीं मला दरडावून विचारलें, “कायरे विठ्या, रस्त्यांतल्या गाड्यांची पूजा करीत असतोस कायॽ” कांहीं झालें तरी मी खरें बोलणारा मुलगा अशी बाबांची नेहमीं खात्री होती. म्हणूनच त्यांचा मी लाडका होतों. मी मोठा खजील झालों तरी पण चाललेला खरा प्रकार असेल तसा सांगितला. त्यामुळे त्यांच्या रागाला वावच न उरल्यामुळें त्यांना उलट माझी कींव आली आणि खरें बोलण्याबद्दल त्यांनीं माझें कौतुकच केलें. गोष्ट अशा थरावर आली म्हणजे माझे आईलाही मध्यस्थी करण्याचें धैर्य होई. शाळेंत जाणा-या लहान मुलाला जेवणाला उशीर होतो म्हणून तिनेंही मला पाठबळ दिलें. शेवटीं मारुतीची ब्याद माझ्या मागची सुटली, मारुतीपेक्षां मला रस्त्यांतली गाडीच पावली म्हणून मीही आनंदलों. मग त्यापुढें देव्हारांतल्या सोन्यारुप्याच्या टाकांच्या कंबराही मी फारशा वाकविल्या नाहींत. कारण केव्हांतरी बाबा पूजा करावयास आले म्हणजे सगळ्या देवांच्या कंबरा वाकलेल्या पाहून हा काय चमत्कार म्हणत. हे देव म्हणजे आमचे आजे, पणजे हे पूर्वजच असत. ते सर्व म्हातारे होऊन वारले होते म्हणून त्यांच्या कंबरा वांकणें साहजिकच होतें. असल्या पुजा-यापासून आमचें रक्षण कर, अशी त्यांनीं ईश्वराजवळ प्रार्थना केली असावी. म्हणून त्यांची व माझी ह्या अवेळीं पुजेच्या चरकांतून सुटका झाली! मूर्तिपूजा ही पहिली पायरी म्हणून तिचें मंडण करणा-यांनीं हा एक धडा घेण्यासारखा आहे. कांहीं असो, बाबांनीं पूजा करणे अगर न करणें केवळ माझ्याच मर्जीवर सोंपवून आपला समंजसपणा प्रगट केला व त्याचा सुपरिणाम असा झाला कीं, माझ्या धर्मबुद्धीला कायमचा धक्का पोंचला नाहीं.
भिंतीवरील थाप
पुढें आई मला केव्हां केव्हां पूजा करावयाला सांगे. पण आईला झुकांड्या द्यावयाला मला कितीसा उशीर लागणारॽ स्वयंपाक घरांतल्या भिंतीवर मी खडूनें एकदां मोठ्या अक्षरानें खालील वाक्य लिहून ठेविलें होतें. “आई! मी उद्यां पूजा करितों, बरें!” दुसरे दिवशीं आईनें मला टोंकलें, “कारे विठू, आज पूजा करणार नाॽ” मी काय मुलखाचा चवचाल पो-या! तिला म्हणे, “आई माझें वाक्य नीट वाच. मी आज पूजा करण्याचें कबूल केलें नसून उद्यां करण्याचें ठरविलें आहे ना?” तो उद्यां कधींच आज येणें शक्य नव्हतें. “लिहिणें वाचणें शिकलीं म्हणजे मुलें कशीं चावट होतात बाई!” म्हणून आई बिचारी गप्प बसे. भिंतीवरील वाक्य माझ्या अवखळपणाचें स्मारक म्हणून कित्येक दिवस तसेंच राहून गेलें. प्रत्यक्ष बाबाही तें पाहून न पाहिल्यासारखें करीत. “हें पोर पुढें कोणाचे हातीं सांपडणार नाहीं” असें भाकीत आईपुढें करून दोघेही माझें मला नकळत कौतुक करीत व स्वस्थ बसत !
मी ऑक्सफोर्ड एथील मॅन्चेस्टर कॉलेजमध्यें दोन वर्षें राहून कॉलेजच्या परीक्षेंत चांगला पास झालो होतो तरी मला कोणतीही पदवी मिळाली नाहीं. याचें कारण हें कॉलेज अगदीं नव्या विचाराचें आणि सुधारलेल्या वळणाचें आणि ऑक्सफोर्ड कॉलेज हें अगदीं जुन्या ख्रिस्ती धर्माला चिकटून असलेले होते म्हणून या कॉलेजला ऑक्सफर्ड विश्वविद्यालयानें मान्यता देणें शक्य नव्हतें म्हणून मॅन्चेस्टर कॉलेजने आपल्या स्वतःचा डिप्लोमा (Diploma) दिला. बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड यांनीं मला ऑक्सफोर्डला जाण्यासाठी प्रवासखर्च दिला होता व येण्यापूर्वी अभ्यासाचा दाखला कॉलेजच्या अधिका-याकडून योग्य रीतीनें आल्यास परत प्रवासखर्च मिळेल अशी अट घालण्यांत आली होती. त्या अटीप्रमाणें मॅन्चेस्टर कॉलेजचे प्रिन्सिपॉल व माझे खास टयूटर (Tutor) या दोघांचे दाखले खालीं दिले आहेतः-
(1) Manchester College. Oxford, March 4, 1903.
The following is the report of Mr. V. R. Shinde presented to the Committee in June 1902 :-
Mr. V. R. Shinde, from want of previous preparation has had considerable difficulty in following the lectures on the New Testament. He has not attended the classes in the Old Testament. He has written two philosophical essays, showing original thought, one on Self-realization and the other on the Genesis of Free-will. He wrote excellent fortnightly papers during the Lent term on subjects connect with the History of Religion in India. During the Summer term be read Pali, weekly with Mr. Carpenter, and made excellent progress through his knowledge of Sanskrit. He has sent in a very thoughtful essay on Theories of Incarnation in “Vishnavism and Budhism”.
In the present session he has attended classes in philosophy with Mr. Upton, in Old Testament with Mr. Addis; and in Doctrinal Theology with me. With his general conduct in the College we are more than satisfied.
(Sd/Dr.) JAMES DRUMMOND,
Principal
(2) Manchester College. Oxford, March 1st, 1903.
Mr. V. R. Shinde, B. A. has attended my lectures on the History of Religion, during two acadamical years with great diligence and faithfulness. He has prepared a series of papers on subjects prescribed for his study with industry, care and insight; and has shown much ability in his power to condence into short compass the results of considerable reading. The work of the second year which I have had from him, has been naturally in advance of that of the first, and has been in every way satisfactory to me. The subjects have included, Hinduism, Mohammedanism, Zardustrianism and the Religions of China. I may add that during one term, Mr. Shinde read with me every week, in the early Pali Texts of Budhism and showed that his Sanskrit knowledge would enable him to make rapid advance in his branch of study.
(Sd/Dr.) J. ESTLIN CARPENTER,
Case Lecturer in Comparative Religion