1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

स्त्रीदैवत

(ता. २०-२-१९१० रोजीं सायंकाळीं मुंबई प्रार्थनामंदिरांत आपल्या साध्वी मातुःश्रीच्या आद्यश्राद्धानिमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.)

ईश्वराचा साक्षात्कार वनामध्यें, मनामध्यें व जनामध्ये अशा तीन ठिकाणी होत असतो. सृष्टीमध्ये सौंदर्य आपल्या नजरेस पडते. नद्या, पर्वत, डोंगर, सागर, महासागर, सकाळ, संध्याकाळ इत्यादिकांमध्ये देव आहे अशी साहजिक समजूत आपली होते, त्याचप्रमाणे आपल्या अंत:करणातही त्याचा मंगल हस्त स्पष्ट दिसतो. सद्सद्विवेकबुद्धी तोच देतो म्हणजे ईश्वर सृष्टीत म्हणजे वनात व मनात आहे ही गोष्ट समजणे फार कठीण नाही, पण ईश्वर जनात आहे हे अजून जसे समजावे तसे समजले नाही. जोपर्यंत जनामध्ये ईश्वराचा साक्षात्कार आपणास पटत नाही, तोपर्यंत वरील दोन पटलेले साक्षात्कार अपूर्ण होत. ह्याकरता जनामधील साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरिता आपण नेहमी झटले पाहिजे व मनात अशी इच्छा धरली पाहिजे की, -“पाहिन जनी जगदीश कधी मी, आस मना ही लागली”.

पूर्ण दयाधन, शाश्वत, पापाचा नाश करणारा, मंगल, भक्तांचे मनोरंजन करणारा असा परमेश्वर जनामध्ये पहावयास पाहिजे. आज मी स्त्रियांमध्ये ईश्वर कसा दिसतो हे सांगणार आहे. स्त्रीस्वभावामध्ये ईश्वरी अंश आहे हे अजून फारसे समजलेसे दिसत नाही : “जसे खारे पाणी पिऊन घन ते गोड करिती । स्त्रिया दु:खा तेवी गिळुनि सुखराशीस वमती ।।”

जर का आकाशात मेघावली नसत्या तर आमची कोण दुर्दशा झाली असती ! पृथ्वीवर एक भाग जमीन व तीन भाग पाणी असून काय फळ ? त्या चट सा-या पाण्याच्या बिंदुबिंदूंतून क्षार भरला असल्यामुळे महासागराचे काठी बसूनदेखील आमच्या व तशाच सकल जीव वनस्पतीच्या कंठाला कायमची कोरड पडली असती, नव्हे ?

जशी गत ढगाविना सृष्टीची, तशीच स्त्रियांविना ह्या संसाराची आहे, हे जाणत्यांनी थोडा विचार करून पाहिल्यास दिसेल. सृष्टीत जसे खारे पाणी ठाईचेच विपुल आहे, तसे संसारात सुखाच्या साधनांची ही समृद्धी आहे तरी पण सुखाच्या ह्या कच्च्या मालाचे पक्के उपभोग्य नग कोण बनविते बरे ?

अविचारी पुरुषांनो ! सुखाचे पक्के नग बनविन्याची कामगिरी पुरुष करतो असे कृतघ्न आणि धआडसी उत्तर तुम्ही उताळवीपणे द्याल. पण किंचित विचार करा ! कृषी, उद्योग, व्यापार, राजकारण, समाजबंधन, धर्मानुशासन आणि तत्वज्ञान अशा ह्या सात पर्यायांनी पुरुष ह्या जगातील सृष्ट संपत्तीवर आपली कुशलता व परिश्रम लढवितो, पण तेवढ्यानेच सुखाचा पक्का नग तयार होतो अशी तुमची समजूत होईल तर ती चुकीची समजा. सुखोत्पादनाचे कामी पुरुषांचे बाहुबळ किंवा बुद्धिबळ ह्या दोहोंची किंमत प्राकृत जड संपत्तीहून काही विशेष निराळी आहे असे नाही. हे सर्व कच्च्या मालाचेच प्रकार समजावेत.

जेव्हा अखेरीस संसाररंगभूमीवर स्त्री येते व तिच्या अंत:करणातील प्रेमलहरींचा ह्या संपत्तीला स्पर्श घडतो तेव्हाच ह्या सर्व संपत्तिपरंपरेचे पर्यवसान पक्क्या सुखात होते, एरव्ही सर्व गाबाळच, ह्यात संशय नको. पुरुषांचे लक्षण वीर्य, तर स्त्रीचे लक्षण सहनशीलता होय. सुखाच्या कच्च्या मालात जो सर्वत्र क्षार भरला आहे तो गाळून गोड करावयाचे झाल्यास तेथे वीर्याचे काहीच चालावयाचे नाही. त्यासाठी सहनशीलतेची बळकट चाळण पाहिजे, आणि ती चाळण स्त्रीलाच लाभली आहे ! ह्या सहनशीलतेच्या द्वारे स्त्री ही पती, पुत्र आणि पिता ह्या तिघांची आज्ञा पाळते इतकेच नव्हे तर त्यांचे लळेही पाळिते. वरवर पाहणारास ती पती आणि पिता ह्यांची आज्ञा पाळते असे दिसेल, पण खोल पाहिल्यास ती त्यांचे लळे पाळते असे दिसेल. सहज पाहताना ती आपल्या कोमल अर्भकाचे किंवा जवान पुत्राचे लळे पाळते असे दिसेल, पण विचारदृष्टीने पाहिल्यास ती त्यांच्या आज्ञाही पाळीत आहे असे दिसेल. लळे होवोत की आज्ञा होओत ज्या दैवी गुणाच्या द्वारे स्त्री त्यांचे पालन करते तो गुण सहनशीलता होय. तो गुण पुरुषामध्ये नाही. पुरुष नादाने किंवा भीतीने किंवा वैतागाने केव्हा केव्हा सहनशील होतो, पण ते सहन करणे नव्हे, ते त्याचे दौर्बल्य होय. तो दैवी गुण नव्हे. कृती करण्याचे जसे एक सामर्थ्य आहे तसेच सहन करण्याचे दुसरे किंबहुना श्रेष्ठ सामर्थ्यच आहे. पहिले पुरुषाला व दुसरे स्त्रीलाच प्राप्त झालेली विशेष धने होत. ह्या दोन जाती ह्या दोन भिन्न दैवी गुनांनी मंडित झाल्या आहेत. पहिल्याच्या योगे सुखाचा कच्चा माल व दुस-याच्या योगे त्याचा पक्का नग तयार होतो.

बाळपणी, तरुणपणी आणि वृद्धपणी स्त्रीचा अत्यंत पवित्र सेवाधर्म – किंवा शुश्रुषाधर्म – चुकत नाही. ती माहेरी असो की सासरी असो तिचे हे असिधाराव्रत चालूच असते. घरी पाळण्यात मूल रडू लागले आणि आईने त्याच्या भावाला हालवावयास सांगितले तर तो फार तर एक दोन झोके देऊन चटकन आईचा डोळा चुकवून आपल्या चेंडूला टोलवीत निसटून जाईल. पण तीच बहीण असेल तर ती आपला खेळ सोडून पाळणा हालवीत राहील. सासरी जशी ती सास-याची व दिराची कटकट सोशील तशी आपल्या माहेरी ती बापाची व भावाची कटकट सोशीत राहील.

भाच्या मामी पतिला । पत्नी पुत्रा होई माता ।।
भावा बहिणी दिरास । वहिनी कन्या होई ताता ।।
- बाबा गर्दे

ह्याप्रमाणे तिला जरी वरवर निराळी दिसणारी पात्रे घ्यावी लागली तरी काम एकच, ते सहन करण्याचे. आमरण व बिनबोभाट ही सहनशीलता तिने पत्करली नसती, पदोपदी तिने आपल्या स्वाभाविक हक्कांचे हवन करून आपल्या पुरुष साथीदारांच्या माथ्यावर कर्तव्याचे ऋण साचविले नसते, तर आमचा हा संसारशकट वंगण नसलेल्या चाकाप्रमाणे कर्कश झाला असता व लवकर झिजला असता. फार तर काय इतके सर्व करून, आपण करतो असा तिने नुसता बोभाटा केला असता तरी आमच्या सुखाची घडी बिघडली असती. ही तिची सहनशीलता केवळ दैवी सामर्थ्यच म्हणावयाचे, दुसरे काय !

भगवान श्रीकृष्ण विभूतिविस्तार सांगून शेवटी एक साधारण सिद्धांत सांगतात-
माझ्या दिव्य विभूतीला अंत नाही परंतपा ।
हा तो विभूति विस्तार म्या संक्षेपेचि वर्णिला ।।
आता जो का भाग्यवंत प्राणी श्रीमंत ऊर्जित ।
तो तो तू जाण की माझ्या तेजांशाचाचि संभव ।।
- अध्याय १०, वामनपंडित

गीताकार प्रत्यक्ष श्रीकृष्णाइतके रसिक आणि सत्यग्राही असते तर त्यांनी वर दिलेल्या विभूतिविस्तारात स्त्रीचे उदाहरण खचित दिले असते. स्त्रीमधीलही श्रीमंत आणि ऊर्जित सहनशीलता दैवी तेजाचा अंश कोण नाही म्हणेल ? साधेभोळे तुकोबा तर आपला निष्कपट अनुभव निवेदन करितात की,
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरवीति ।।

भक्त केशवचंद्र सेन ह्यांनी खाली वर्णिल्याप्रमाणे चहूंदिशी ईश्वरीरूप पाहून नमस्कार केला आहे :
हा विशाल संसार । तव प्रिय परिवार ।
नरनारी त्वत् प्रकाश । महिमा अपार ।
स्त्रीलोक-बालक-शत्रु-मित्र पदी वारंवार नमस्कार ।
तुम्ही सर्व मूलाधार ।।
नमो देव, नमो देव । नमो निरंजन हरी ।।धृ।।

ह्यावरून आपण स्त्रीच्या ठिकाणचे दैवत ओळखले पाहिजे, इतकेच नव्हे, तर त्याला अत्यंत आदरपूर्वक अनेकवार नमन केले पाहिजे. असे असून रामकृष्णादिकांचे ठायी पराक्रम पाहून किंवा बुद्ध, ख्रिस्तादिकांचे प्रेम पाहून केवळ पुरुषांच्या ठायीच आम्ही ईश्वर पाहतो हे कसे ? भारत, रामायण आणि इलियड ही सारी पुरुषांचीच गोडवी गात आहेत तर काय ? पण पुरातन काळापासून आमची सहचारिणी आम्हांबरोबर चालत आलेली अबला स्त्री तिच्यामध्ये काही दैवी अवतार नाही काय ? ईश्वराचा कर्तृत्वशक्तिरूपी जो प्रखर अंश त्याचे द्योतक म्हणून चंडी, मुंडी, महाकाली इत्यादी देवींची रूपे आम्ही हिंदूंनी कल्पिली आहेत. पण तो प्रकारही पौरुष गुणांचा सत्कार झाला. सहनशक्तिरूपी ईश्वराचा जो सौम्य अंश आहे त्याची कल्पना आम्हा अवतारप्रिय हिंदूंना अद्यापि नाही हे किती नवल आहे.

“मातृदेवो भव” मातेच्या ठायी देवाला पहा असे मनूजी सांगतात. पण स्त्री सर्व अवस्थेत सर्व प्रसंगीही माताच असते. पती, पिता, पुत्रादिकांचे ती सर्वच काळी अपराध सहन करिते, शुश्रुषा करिते आणि लाड पुरविते म्हणून ती सर्वांची सारखीच माता म्हणावयाची. तर आपण केवळ मातृदेवो भव असे न म्हणता स्त्रीदेवो भव असे म्हटले पाहिजे. ज्याने आपल्या पत्नीला तुच्छ मानिले, कन्येला हेळसांडले, सुनेला लाथाडले, त्याने नुसत्या आपल्या मातेपुढे मात्र मान लवविली तर तो त्याचा मिथ्याचार समजावा. आपली बायको, बहिण, मुलगी, सून ह्या सर्वजणी कोणाच्या तरी आया असणार किंवा होणार व आपली आईही तशीच कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी सून असणार. तर मग दुस-या कोणाचा तरी देव तो आपला पायपोस आणि आपण धि:कारलेली वस्तू दुस-या कोणाचे तरी पूजास्थान हा कोण प्रकार ? पूज्यतेच्या बाबतीत हा उलटासुलटा न्याय अत्यंत दु:सह आहे.

दुस-या एका प्रकारच्या लोकांचा धर्म ‘स्त्रीदेवो भव’ असा असतो तसा मात्र येथे अर्थ समजू नये. नामदेवानी म्हटले आहे की,

ऐका कलियुगाचा आचार । अधर्मपर झाले नर ।।१।।
मंचकावर बैसे राणी । माता वहातसे पाणी ।।२।।
स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ।।३।।
स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडी ।।४।।
सासु सास-या योग्य मान । मायबाप न मिळे अन्न ।।५।।
साली सासवा आवडती । बहीणभावा तोंडी माती ।।६।।
स्त्रियेसी एकांत गोडी । मातेसी म्हणे xx वेडी ।।७।।
म्हणे विष्णुदास नामा । ऐसा कलियुगीचा महिमा ।।८।।

वर वर्णिलेल्या मिथ्याचाराचा निषेध कोणीही करील. कारण ह्या ठिकाणी पुरुष स्त्रीचे ठायी देव पहात नसून एक उपभोग्य वस्तू पाहून तिच्या ठिकाणी लाचावलेला असतो, इतकेच. हा प्रकार केवळ तामसी झाला. ज्या स्त्रीच्या पोटी आपण झालो तिने आपल्याला प्रेमाने, सहिष्णुतेने आणि कौतुकाने वागविले म्हणून तिलाच तेवढे देव मानणे हा प्रकार राजसी झाला. पण स्त्रीजातीच्या ठायी हे दैवी गुण स्वाभाविकच आहेत हे जाणून सर्व स्त्रीजातीला पूज्य मानून तिचा सत्कार करणे हा सात्विक प्रकार होय, हेच सुधारकाचे लक्षण, हीच सभ्य गृहस्थाची चालरीत समजावी.

सहनशीलता हा गुण पुरुषामध्ये मुळीच नसतो असे नाही. कित्येक पुरुषांमध्ये स्त्रीस्वभावाचे प्राबल्य असते. तसेच उलटपक्षी कित्येक स्त्रियांमध्येही शौर्यधैर्यवीर्यादी पुरुषस्वभावाचे प्राबल्य दिसून येईल. तात्त्विकदृष्ट्या पाहता स्त्रीपुरुष हा भेद केवळ शारीरिक नाही तर मानसिक आहे हे उमगेल. शौर्य आणि सहिष्णुता हे दोन्ही दैवी गुण होत. एक सामर्थ्यदर्शक, दुसरा दौर्बल्यदर्शक अशातला प्रकार नसून दोहोंमध्ये भिन्न प्रकारचे ईश्वरी सामर्थ्यच आहे असे जाणले पाहिजे. आणि ह्या दोहो प्रकारच्या सामर्थ्याची सुसंगत घडल्यामुळेच संसार चालत आहे. एरवी तो चालणे शक्य नाही हे जाणून हे दोन गुण ज्या दोन भिन्न जातींमध्ये विशेषपणे वसत आहेत त्यांनी परस्परांशी योग्य आदर राखावा, स्वत:चीच बडेजावी मिरवू नये, म्हणजे संसार सुरळीत चालेल, इतकेच नव्हे तर नर आणि नारी ह्यांचे ऐक्य होऊन एक पूर्ण पुरुष उदय पावेल आणि तेथेच ईश्वरदर्शन किंवा ब्रम्हसाक्षात्कार घडेल.
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।

स्तुति, निर्भत्सना व निंदा

(रा. रा. द्वारकानाथ गोविंद वैद्य यांच्या घरीं कौटुंबिक उपासनेच्या वेळीं मंगळवार ता. ७-१२-१९०९ रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)

जाणोनि नेणतें करीं माझें मन |
तुझी प्रेमखूण देऊनियां ||१||
मग मी व्यवहारीं असेन वर्तत |
जेवीं जळा आंत पद्मपत्र ||२||
ऐकूनि नाइकें निंदास्तुति कानीं |
जैसा का उन्मनी योगीराज ||३||
तुका म्हणें ऐसें झालिया वांचून |
करणें तें तें शीण वाटतसे ||४||

संसार करीत असतांना आपल्याला अनेक प्रकारच्या व्यवहारात निमग्न रहावे लागते. आणि हे व्यवहार करीत असताना आपली स्तुती ऐकण्याचे प्रसंग प्रत्येकास येतात. निंदेचेही प्रसंग येतात, त्यांचा विचार पुढे करू. परंतु आपले हातून सदव्यवहार घडो, किंवा अविचाराची कृत्ये होवोत, आपली कोणी ना कोणी केव्हा तरी स्तुती करणारे आढळतेच! बाहेरचे कोणी नसले तरी आपले आप्त, आपली बहीण, पत्नी असे कोणी तरी आपली स्तुती करतेच. तूर्त हा स्तुतिनिंदेचा विचार मनात यावयास आमचे तरूण मित्र रा. रा. केशव सदाशिव केळकर ह्यांनी केकावलीवर जो एक लहानसा वाचनीय निबंध लिहून प्रसिद्ध केला आहे, त्याच्या अखेरीस दिलेल्या केकांतील पुढील केका विशेष रीतीने कारण झाली आहे :

गमो मधुर हें विष स्तवन सेवितां माजवी ।।
कर मलिन सद्यशोमुख हलाहला लाजवी ।।
हरापरिस तूं बरा प्रभुवरा सदा जो पिशी ।।
असा रस समर्पि त्या अमृत आपुलें ओपिशी ।।

ह्या केकेमध्ये पंतांनी हरीला हरापेक्षा म्हणजे शंकरापेक्षा श्रेष्ठ ठरविले आहे. शंकराने हलाहल नामक अत्यंत जहाल विष एकदा प्राशन केले. आणि त्याने ते पचविलेही. परंतु त्याचा शेष राहिला म्हणून म्हणा किंवा दुस-या काही कारणामुळे असो त्याला नीलकंठ असे म्हणतात! तथापि परमेश्वराची स्थिती ह्यापेक्षा फार निराळी आहे. अत्यंत जहाल जे हलाहल विष त्याच्याही पेक्षा जहाल विष ह्या जगात आहे. त्याचे परमेश्वर सेवन करतो, ते घटाघटा पितो एवढेच नव्हे तर ‘असा रस समर्पि त्या अमृत आपुले ओपिशी’ इतके जहालातले जहाल विष कोणते? तर ते ‘स्तुती’ होय. हे विष आहे असे आम्हांला वाटतही नाही, म्हणून आम्ही ते पचवितो, घटाघटा त्याचे प्राशन करतो, पण त्याचा अत्यंत अनिष्ट परिणाम झाल्यावाचून राहत नाही. आम्हांला आमची कोणी स्तुती केली म्हणजे जरा बरे वाटते. काम करण्यास उत्साह येतो असे वाटते व काम करण्यास उत्साह यावा, उत्तेजन मिळावे म्हणून स्तुतीची आवश्यकता आहे असे वाटू लागते. विडी ओढण्याचे व्यसन ज्यास अद्याप लागलेले नाही अशा मनुष्याने विडीचा एक झुरका मारला की, त्यास मोठी हुषारी आली असे वाटते, पण पुढे ते उत्तेजन वगैरे बाजूस राहून धूम्रपान हे त्यास व्यसनच जडते व त्यावाचून त्याचे चालत नाहीसे होते. स्तुतिरूपी हे विष त्याहून वाईट आहे. व्यसनाचे अनिष्ट परिणाम आपल्याला दिसतात, व्यसन वाईट म्हणून टाळण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. पण मनुष्य एकदा स्तुतिप्रिय झाला की मग त्याच्या अधोगतीस सीमा नाहीशी होते हे आपण नित्य लक्षात ठेविले पाहिजे. आपल्या ठिकाणी पात्रता नसता आपली जी स्तुती होते त्याच्यायोगे जडता प्राप्त होतेच, परंतु हा पात्रापात्रतेचा विचार तूर्त दूर ठेविला तरी स्तुती आमच्या अधोगतीसच कारण होते असे दिसून येईल.

मी एकादे उपयुक्त कार्य करीत आहे असे वाटून लोक माझी स्तुती करू लागतात. लोक बरे म्हणू लागताच ते कार्य प्रथम अधिक उत्साहाने करावयास लागतो, पण हा उत्साहच माझ्या घातास कारण होतो. नंतर लोकांनी माझी स्तुती केलीच पाहिजे अशी भावना माझअया ठिकाणी उत्पन्न होते. स्तुतीला मी पात्रच आहे, इतरांपेक्षा मी थोर आहे, माझ्या ठिकाणी इतरांपेक्षा परोपकारबुद्धी अधिक वास करीत आहे, देशहिताची आस्था मलाच आहे असे वाटून मी अधोगतीस जात असतो आणि ह्या माझ्या अवनतीस, हलाहलापेक्षाही जहाल जे स्तुतिरूपी विष तेच कारण झालेले असते.

आता आपण निंदेविषयी थोडा विचार करू. आणि तो करीत असता निर्भर्त्सनेसंबंधाने असे दोन शब्द सांगणे जरूर आहे की, कोणाच्याही हातून घडलेल्या वाईट कृत्याबद्दल जी निर्भर्त्सना होते ती व निंदा एक नव्हेत. निर्भर्त्सना होणे हे ठीक आहे. नीच कृत्य होत नसूनही आपणास दोष देण्यात येत असतो, आपल्याविषयी भलभलते ग्रह आपल्या सभोवार होत असतात, चर्चा चालू असते, ती निंदा. निर्भर्त्सना व सत्कृत्य ही एके ठिकाणी असू शकत नाहीत. धडधडीत सत्कृत्य करणाराची जर कोणी निर्भर्त्सना करू लागला तर त्यास आपण वेडापीर म्हणू !

पण, निंदेचे तसे नाही. स्तुती ज्याप्रमाणे आम्हांला जहाल विषाहून विष वाटू लागली पाहिजे त्याप्रमाणे निंदा हे एक अमृतच आहे असे आम्हांस वाटू लागले पाहिजे. कोणी आणची निंदा केली की, आम्ही प्रथम अगदी निरूत्साह होतो, आमची आस्था डळमळू लागते, आमच्या ठिकाणी एक प्रकारची उद्विग्नता नांदू लागते व निंदा करणारासंबंधाने अनादर, हेवा इ. आमच्या ठिकाणी जागृत होतात. पण असे न होता निंदा ही आम्हांला अमृताप्रमाणे वाटू लागली पाहिजे ! निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला कळू लागतात, त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी जागृती होते, आपले दोष आपणच शोधून काढावे अशी मनाची प्रवृत्ती होऊ लागते. आपण सत्कृत्यामध्ये निमग्न असूनही निंदा होते असा अनुभव आला म्हणजेही ‘जेवी जळा आत पद्मपत्र’ अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे जे तुकोबांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटले आहे ते ह्याचसाठी की निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला सहज कळतात. परंतु विनाकारण निंदा होत असली, तरी तिजकडे आपण दुर्लक्ष करून, ही अशी निंदाच माझ्या शुद्धीस कारण होईल असे मानून आपण आपल्या कार्यामध्ये रत असले पाहिजे, निंदा अमृततुल्य मानावयास लागले पाहिजे.

मार्कस आरेलिअस ह्यानें एके ठिकाणीं म्हटलें आहे :-

“Do but your duty and do not trouble yourself,
whether….you have a good word or bad one…..

श्रीकृष्णाचा कर्तव्यनिष्ठेसंबंधानें आपल्याला असाच उपदेश झालेला आहे. सारांश, व्यवहारामध्ये आपण नांदत असताना स्तुति-निदां ऐकण्याचे प्रसंग आपल्यावर वारंवार येत असतात. आम्ही निंदेला भीत असतो. पण खरे पाहता स्तुतीला आम्ही अधिक भ्यावयास पाहिजे. कारण स्तुती आमच्या घातास कारण होते. स्तुतीचे व्यसन जडले म्हणजे इतरांनी आपली स्तुती केलीच पाहिजे असे आपणांस वाटू लागते. पण, निंदा ही आमची मैत्रीण होऊ शकते. निंदा आम्हांस कर्तव्यनिष्ठा करणारी, विनम्रवृत्ती अंगामध्ये भिनवणारी, इतरांविषयी मनामध्ये उदारभाव उदित करणारी, स्वत:च्या दोषांविषयी चित्तामध्ये जागृत ज्योत पेटविणारी अमृतवल्ली आहे! अशा प्रकारे आपण आपल्या कर्तव्यात निमग्न असताना स्तुतिनिंदेचा योग्य उपयोग जर आपण करून घेऊ लागलो तर आम्हांपैकी प्रत्येकाला मार्कस आरेलिअसप्रमाणे “I do my duty that is enough”. मी माझ्या कर्तव्यात एकनिष्ठेने निमग्न आहे. तितकेंच मला पुरें आहे, असें म्हणतां येईल.

स्कॉच सरोवरांत

स्कॉटलंडचे राजधानीचे शहर एडिंबरो हे सगळ्या ग्रेटब्रिटनात अत्यंत सुंदर आहे. समुद्रकाठी टेकड्यांच्या आंदोलावर, ह्यास ठिकाण फार अनुकूल मिळाले असून, स्वतःचा बांधाही पाखरासारखा आटोपशीर व टुमदार आहे. त्यामुळे अवजडशा लंडनसारख्या शहरातून आलेल्या पांथाचे मन ह सकृद्दर्शनीच हरण करिते. युरोपात हे एक पाहण्यासारखे स्थळ असून आत्मसंतुष्ट स्कॉच लोकांस ह्याबद्दल मोठा अभिमान वाटत आहे. आजूबाजूच्या सात टेकड्यांमध्ये हे वसले असल्याकारणाने स्कॉच लोक ह्यांस आधुनिक अथेन्स असे म्हणतात, व आल्यागेल्यांस त्यंचे मत विचारतात. इतकेच नव्हे तर अथेन्सची सर आणण्यास तेथील एका प्राचीन इमारतीच्या अवशेष राहिलेल्या खांबांच्या रांगेचे येते एका टेकडीवर हुबेहूब अनुकरण केले आहे. ह्या स्वच्छ व सुखी नगरीत एक आठवडा घालवून पुढे मी ग्लासगो येथे गेलो. उद्योगाची धडधड, व्यापाराची घडामोड, गर्दी, धूर आणि धुरळा इ. आधुनिक सुधारणेची वरवर दिसणारी लक्षणे येथे भरपूर आहेत. तीनच दिवस येथे राहून माझे इष्ट स्थळ जो स्कॉच सरोवर प्रांत, तिकडे निघालो. पण तितक्याच अवधीत मला भावी एकांताच्या सेवनार्थ फार चांगली भूक लागली होती.

ग्लासगोच्या एका धुकटलेल्या बोगद्यातून आगगाडीने मला फरफटीत बाहेर ओढून एके सुप्रभाती क्लाईड नदीच्या खाडीत निवांत पाण्यावर आणून सोडिले. किती तरी आराणूक वाटली मनाला! पण येथेही माणसांची गर्दी काही चुकली नाही. इतका वेल कामात गुंतलेल्यांच्या गर्दीत होतो, तर आता विश्रांती घेणा-यांच्या गर्दीत पडलो! ज्या बोटीत मी उतरलो ती आधीच भरून गेली होती. अशा भरलेल्या बोटी वेळोवेळी बंदरातून निघून, गिरिगव्हर, मैदान, जंगल इ. निरनिराळ्या प्रांती शिरत. ह्या गर्दीपैकी काहीना काम फार पडल्यामुळे व काहीना काम मुळी नसल्यामुळे शीण आला होता. तथापि शरण आलेल्यांचे गुणावगुण न पाहता सृष्टिमाता सर्वांचे सारखेच सांत्वन करू लागली. सुधारणेचा ताप किती आहे हे खरे पहावयाचे असल्यास एकाद्याने अशा विश्रांतीच्या ठिकाणी किती व कोणत्या प्रकारची झांगड लागून गेलेली असते ते पहावे. इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड इतकेच नव्हे तर युरोपातील निरनिराळ्या ठिकाणांहून विशेषेकरून अमेरिकेतून लोक येथे येतात व तसेच इतर ठिकाणीही जातात. डोंगराच्या खबदडीतही सुखाचे प्रत्येक साधन पुरविणारी, व अहर्निश सृष्टि-नटीचे सर्व हावभाव दाखविणारी हॉटेले येथे सर्वत्र सज्ज होऊन वाट पहात उभी आहेत. खुश्कीने व जलमार्गाने प्रवासाचे दर कमी करून भपकेदार वर्णनाची गाईडबुके लिहून, जाहिराती देऊन वगैरे वगैरे नाना उपायांनी व्यापारी लोक गि-हाईकांस घरातून बाहेर काढतात. तशात, फॅशनदेवीचे नवस पुरविणेही इकडे फार जरूरीचे झाले आहे. ज्या ठिकाणी हिवाळा व पावसाळा घालविला तेथेच उन्हाळ्यातही राहणे म्हणजे इकडच्या संभावितपणाला शोभत नाही. अशा अनेक कारणांमुळे मला ही गर्दी जमलेली पाहून फारसे आश्चर्य वाटले नाही. आश्चर्य वाटले ते हे की, ह्या लोकांची विश्रांती घेण्याची त-हा दगदगीचीच. निदान मला ती तशी भासली. रेल्वेवर काम करून शिणलेले तरूण पुरुष, पोस्टात खपणा-या तरूण मुली, गिरणीतले मजूरही, एथील निरनिराळ्या भागांतील इतिहासप्रसिद्ध स्थळे व सुंदर देखावे रात्रीचा दिवस करून पाहून जात असतात.

असो. आमची आगबोट क्लाईड नदीच्या रूंद खाडीतून लवकरच लाखलाँग नावाच्या सुंदर व चिंचोळ्या सरोवरात शिरली व स्कॉटलंडच्या पश्चिम भागातील हायलँड नावाच्या जगप्रसिद्ध डोंगरी प्रदेशात वरवर जाऊ लागली. दोहोंकडे केवळ सामसूम होते. शांती आणि समाधान ही स्वर्गीय भावंडे पहाटेच्या प्रहरी येथे विश्रंभाने दोहों काठांवर झोपीच गेली होती जणू! प्रत्येक वळशासरशी नवेनवेच पडदे आम्हांपुढे पसरत. आता सरोवर संपले, पुढील खडकावर आम्ही उतरणार असे म्हणतो तोच पुन: पाणी आणि पर्वत, गवत, वृक्ष आणि वेली ह्यांचे अकल्पित भांडार पुढे दिसू लागे. अखेरीस लॉखलाँगच्या अगदी शिरोभागी अँरोखर नावाच्या जंगली बंदरात आगबोट रिकामी झाली. ह्या लहानशा ठिकाणी घरापेक्षा हॉटेलांचीच संख्या अधिक होती आणि घरात राहणा-या साध्याभोळ्या हायलंडरांनाही ह्या लाघवी सुधारणेने पैशाची चट लावून दिली होती हे लवकरच दिसून आले.

येथून दीड मैलावर सगळ्या, ‘स्कॉच सरोवराची राणी’ जी लॉखलोमंड तिचा अमल सुरू होतो. ह्या सर्व प्रदेशात वस्ती फार विरळ विरळ आहे. मैल-दीड मैलावर एकादी शेतक-याची झोपडी अगर गृहस्थाचा वाडा लागतो. सुदैवाने ह्या एकांत स्थळी मला तीन निरनिराळ्या झोपड्यांत जागा मिळाल्याने ह्या सर्व प्रदेशात फिरून पाहण्यास सापडले, आणि हॉटेलात राहणा-या नागरिक लोकांचा संसर्गही थोडा वेळ चुकविता आला. लॉखलोमंडच्या दुस-या बाजूस ४-५ मैलांवर प्रख्यात कवी सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या ‘लेडी ऑफ दि लेक’ ह्या काव्यातील मुख्य स्थळ लॉख कॅट्रीन हे आहे. ही तर सौंदर्याची खाणच स्कॉट कवीला लाभली होती. सरोवराच्या शिरोभागी ट्रोसॉक्स नावाच्या मनोहर दरीकडे जाताना एलन्स आईल नावाचे वरील काव्यातील नायिकेचे सुंदर स्थान लागते. त्याला अगदी चिकटूनच प्रेक्षकांची नौका जात असताना प्रत्येकाचे अंतःकरण सद्गदित झाल्यावाचून राहत नाही. यावत्काळ हा डोंगर, हे सरोवर व ही दरी पृथ्वीवर राहतील तावत्काळ स्कॉटच्या नावाला व त्याच्या साध्या सरळ व सोप्या भारतीला बाध येणार नाही ही साक्ष पटते. मी दरीत शिरलो तेव्हा :

“All in the Trossak’s glen was still,
Noon tide was sleeping on the Hill”

हा कवीचा दाखला मला प्रत्यक्ष पटला! येथून पाऊल परत घेणे जिवावर आले !

सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद

डेव्हनपोर्ट
ता. ३-४-१९०२

परवां गुडफ्रायडेच्या दिवशी येथील निरनिराळ्या ख्रिस्तीधर्मपंथांच्या देवळांत निरनिराळ्या थाटाच्या उपासना सर्व दिवसभर झाल्या. अज्ञान, दुराग्रह, सवय किंवा दुस-या अनेक अज्ञेय आणि अनिर्वाच्य कारणांमुळे ह्या सुधारणेच्या शिखरास पोहोचलेल्या राष्ट्रातसुद्धा अद्यापि धर्मभोळेपणाचे जे अवशेष राहिले आहेत, त्यांचे दिग्दर्शन वरीलप्रसंगी बरेच झाले. त्यांपैकी काही अनुभवाचे मासले आपल्याकडे पाठविणार होतो, इतक्यात ता. ११ मार्च १९०२ च्या केसरीने कृष्णातटाकी नुकत्याच घडलेल्या सोमयागाची गोष्ट यथासांग सांगितली. ती ऐकून दुस-याचे घरी डोकावून पाहून तेथे काय चालले आहे त्यासंबंधी चर्चा करण्यापूर्वी आपल्याच पायाखाली काय जळते आहे, ह्याची पृच्छा करणे अधिक जरूर वाटले. केसरीने सांगितलेली गोष्ट ऐकून केसरीचे आभार व त्या गोष्टीबद्दल विस्मयपूर्वक विषाद एका दोघांसच नव्हे तर पुष्कळांस वाटण्याचा संभव आहे. आणि खरोखर तो संभव नसेल तर विषाद वाटण्याला सोमयागाहूनही हे एक दुसरे जबर कारण आहे असेच म्हणावे लागते.

एकाद्या आडरानात चारचौघा कोळ्यांनी एकाद्या शेंदूर माखलेल्या दगडाच्या म्हसोबापुढे जमून ‘जय म्हसोबा! भगतावर कृपा कर’ अशी मराठीत साधी प्रार्थना करून एकादे कोंबडे कापले आणि म्हसोबाचा प्रसाद म्हणून ते सर्वांनी मिळून गिळिले तर होणारा जो प्राकृत यज्ञ तो, आणि कृष्णातटाकी वीस विद्वान ब्राह्मणांनी तीन बक-यांस बुक्क्यांनी मारून शेवटी त्याचे तिळाएवढे मांस खाऊन जी संस्कृत कंदुरी केली ती, या दोहोंमध्ये वास्तविक फरक किती आहे! फरक जर असेल तर तो हाच की साध्या मराठी अनार्य यज्ञाचा साधारण समाजावर म्हणण्यासारखा परिणाम घडत नाही, आणि ह्या थाटाच्या खर्चाच्या सोवळ्या आर्यजत्रेचा परिणाम उच्चवर्गापासून तो खालपर्यंत समाजावर इतका जोरदार घडतो की बिचा-या उदार धर्मास दोन पावले आणि दोन दशके मागे हटावे लागतेच !!

सोमयागाचे एकंदर वर्णन वाचून त्यात तीन निरूपद्रवी बक-यांचा सदोषवध अगर निरर्थक खून याखेरीज दुसरे काहीही धडधडीत अनीतीचे अगर अन्यायाचे नाही ही गोष्ट प्रथम दर्शनीच धर्मवेडाच्या अगदी कट्ट्या शत्रूसही साफ कबूल करावी लागेल. (तशी काही अनीती अगर अन्याय असला तर कायद्याने त्याचा सक्त बंदोबस्त कधीच झाला असता, हेही सांगावयास नको.) समाजात उत्तरोत्तर विकसित होणा-या न्याय, नीती आणि शिष्टाचार ह्या तीन गोष्टीं संभाळून कोणाही व्यक्तीस अथवा समूहास आपले जुने आचार मोठ्या थाटाने साजरे करून मनाची करमणूक अगर दुसरी कसलीही समजूत करून घेण्याची पूर्ण मुभा आहे.ते जुने आचार त्यांच्या कितीही पूर्वदशेतील असोत, त्यांची परंपरा आजघडीपर्यंत सारखी चालू असो, किंवा मध्यंतरी हजारो वर्षांची खळ पडली असून आजच त्यांची आठवण होऊन त्यांच्या जीर्णोद्धाराचा काळ आला असो, कोणत्याही बाजूने पाहिले तरी ते आमचे आचार आम्ही करण्याचा आमचा जो बाणेदार उपजत हक्क आहे, त्यास रतीमात्र बाध येत नाही, इतकेच नव्हे तर सार्वभौम सर्व सामर्थ्यवान, सरकारासही ह्या हक्काकडे वाकड्या नजरेने पाहण्याची छाती नाही. ह्या सर्व गोष्टीं समाधानकारक आहेत ह्यात शंका नाही.

पण येथे हक्काचा किंबहुना आवडीचाही विचार कर्तव्य नाही. ह्या घडलेल्या प्रकरणात धर्म कितपत आहे किंवा तो मुळी आहे की नाही, किंबहुना बक-यांच्या रूपाने धर्माचाच येते खून घडला आहे की काय, ही गोष्ट दिसल्यास पाहणे आहे, आणि डोळे उघडे असल्यास ती दिसण्यास मुळीच कठीण पडणार नाही, ह्याची खात्री आहे. घडलेला प्रकार जर गमपत्युत्सवाप्रणाणे केवळ राष्ट्रीय उत्साह वाढविण्याप्रीत्यर्थ घडला असता तर त्यात विशेष मन घालण्याची जरूरी नसती. पण ज्याअर्थी तो अस्सल धर्माच्या नावावर घडला आहे, त्याअर्थी त्याजकडे सर्व मुमुक्षू जनांचे लक्ष पोहोचले पाहिजे. आणि विशेषेकरून धर्मसुधारकांचे ह्या बाबतीत ओदासीन्य तर अगदी अक्षम्य होईल.

आत-बाहेर सर्वत्र नांदणारा जो परमात्मा आणि व्क्तिविशिष्ट जो जीवात्मा ह्यांचा परस्पर संबंध आणि निरंतर समागम ह्यांस, धर्म म्हणतात. अंतर्याम, उच्च मनोविकार, नैतिक शक्ती इत्यादिकांच्या द्वारे, बाह्यसृष्टी, अंत:सृष्टी आणि जगाचा विकासमय इतिहास ह्या तीन प्रदेशांत जिवंत जागृत परमेश्वराचे प्रतिक्षणी काय काय व्यापार घडतात ते ओळखणे, कृतज्ञतापूर्वक त्याचे सान्निध्य साधणे आणि संसारातील लहान मोठी कामे त्याच्या सान्निध्यास शोभतील अशा रीतीने करणे ही आमची धार्मिक कर्तव्ये. तीन साडेतीन हजार वर्षांपूर्वी आमच्या आर्यपूर्वजांनी जेव्हा हिंदुस्थानाच्या काठावर प्रथम बि-हाड ठेविले असेल तेव्हा परमेश्वराचे बाह्यसृष्टीतील विलास पाहून ते किती मोहित झाले असावेत ह्याचे साद्यंत दाखले वेदात आढळतात. आपल्या साध्या सरळ आणि जिवंत भाषेत त्यांनी देवावरची गाणी गाइली. फूल नाही फुलाची पाकळी, जे काही ज्यांच्याजवळ होते त्याचा थोडा भाग, नवीन भेटलेल्या देवास आपली कृतज्ञता दर्शविण्यासाठी त्यांनी सांज-सकाळ अर्पण केला, हे त्यास कितीतरी शोभले! पण कालांतराने जेव्हा ह्या परकीयांच्या वसाहती उत्तर-हिंदुस्थानात ब-याच पसरल्या आणि ह्यांचे सांपत्तिक व सामाजिक वैभव पुष्कळ वाढले, तेव्हा अर्थात वरील आराधनेचा स्वाभाविकपणा नाहीसा होऊन तिच्यात कृत्रिमपणा शिरला. पूर्वी जे अंत:करणाच्य देठापासून निघत होते, तेच आता जिभेच्या व ओठाच्या शेवटापासून निघू लागले. पूर्वी  प्रत्येक घरधनी आपला आपणच योद्धा, कुणबी व उपाध्याय होता, पण आता त्या तीन कामक-यांच्या तीन जाती बनल्या, आणि धर्माच्या नावावर कर्मठपणा वाढू लागला, पण अद्यापि ब्राह्मण तेज लयास गेले नव्हते. खरे जे ब्रह्मवीर होते. त्यांनी अरण्यातच राहून उपनिषदांतून ह्या कर्मठपणाचा जोराने निषेध केला आणि धर्माची इमारत बाह्यसृष्टीतल्या साक्षात्कारावरून उठवून ती अंत:सृष्टीच्या अधिक खोल व खंबीर पायावर उभारली. आमच्या धार्मिक इतिहासातील हा पहिला निषेध (Protestantism) होय. पण ह्या रानातील मानसिक चळवळीमुळे गावांतील बहुजनसमाजातील कर्मठपणा कमी होणे शक्य नव्हते. म्हणून त्यास वैतागून गौतमबुद्धाने दुसरी धर्मसुधारणा केली (ख्रि. श. पूर्वी ४६८) सुमारे १०००-१२०० वर्षांनी बुद्धाच्या सुधारणेचाही जोर संपला आणि कर्मठपणाच्या लाटा तर पूर्वीपेक्षाही जास्त उंच उसळू लागल्या! नंतर १२ व्या शतकापासून तो १६ व्या शतकाअखेर सर्व हिंदुस्थानभर नानक, चैतन्य, तुकाराम वगैरे साधुसंतांनी तिसरी सुधारणा केली. आता २० व्या शतकातला प्रकार आमच्या डोळ्यांपुढेच आहे.

धर्माचे जे लक्षण वर सांगितले आहे आणि त्या लक्षणाचा जो धर्म उपनिषदे, भगवद्गीता, गौतमबुद्ध आणि आधुनिक साधू यांनी प्रचारिला, त्या सनातन धर्माचा कोणता भाग किती अंशाने वरील सोमयागात आहे आणि ज्यांस प.वा. आगरकरांनी आपल्या एका निबंधात ‘हे भीषण, बीभत्स हिंदुधर्मा........तू आपले तोंड लवकर काळे कर,’ अशी सक्त नोटीस दिली आहे, त्या धर्माचा किती अंश ह्या सोमयागात आहे, ह्यांचा विचार धर्माची ज्यांना म्हणून किंचित तरी पर्वा आहे, त्या प्रत्येकाने आपल्या स्वत:शी केला पाहिजे. बाकी ज्यांना धर्माच्या नावाने नुसती करमणूकच करावयाची असेल अगर दुसरा कसला तरी अर्थ साधावयाचा असेल, त्यास हाच काय पण दुसरा कोणताही प्रकार चालेल आणि शोभेल. कृष्णातटाकी जमलेल्या वीस विद्वानांच्या विद्वत्तेसंबंधाने कोणासही शंका घेण्याचे कारण नाही. पाच दिवस एकसारखे तिन्ही वेदांचे पाठ ह्यांनी बिनचूक आणि बिनविलंब म्हटले तर श्रौतवाड़मयात ह्यांची नंबर एकची गती असली पाहिजे. पण ह्यांच्या ह्या अमूल्य संपादणुकीचे चीज अशा योगाने होईल काय? इकडे पाश्चात्य पंडित, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश भाषांतून वैदिक वाड़मयाचा प्रत्येक शब्द उतरवीत आहेत,  तर ह्या ब्राह्मण विद्वानांनी त्या वाड़मयाचे निदान काही वेचे तरी देशी भाषेत उतरविल्यास त्यांची योग्य संभावना होणार नाही काय? जुन्याचा खरा उद्धार अशा रीतीने होईल की तीन हजार वर्षांपूर्वी ज्या गोष्टी जशा घडल्या त्या आता तशाच उठविल्याने होईल?

शेवटी धर्माच्या बाबतीत उदासीन राहणा-या नास्तिक व अज्ञेयवादी सुधारकांनीही हे लक्षात ठेविले पाहिजे की धर्माच्या नावाने जी ही थोतांडे वेळोवेळी उपस्थित होतात व वाढत जातात ती त्यांची केवळ थट्टा किंवा निंदा केल्याने नाहीशी होत नाहीत. उलट लोकमतांचे ह्या थोतांडास पूर्ण पाठबळ असल्याने ह्या रिकामटेकड्या सुधारक थट्टेखोरांचीच थट्टा होते. शिवाय ही सर्व थोतांडे नाहीशी झाली तरी म्हणजे मोठासा कार्यभाग झाला असे नाही. शुद्ध धर्माची ज्योत राष्ट्रात सतत जळती राखल्यासच राष्ट्राच्या अनेक चळवळीस जोम येईल आणि ह्यास्तव प्रत्येक देशभक्ताने धर्मसुधारणेचें काम हस्तें परहस्तें करणें जरूर आहे.

सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र

(सुबोधपत्रिका ता. ०९-०८-१९०३)

इकडे शुद्ध व उदार धर्माच्या अनेक चळवळी चालू आहेत. त्यात स्त्रिया अलीकडे बहुतेक पुरूषांच्या बरोबरीने पुढाकार घेऊ लागल्या आहेत. युनिटेरिअन्स हे सुधारलेल्या देशातले सुधारक असल्याने त्यांच्यात तर हा प्रकार विशेष दिसून येतो आणि तो दिवसेंदिवस वाढतच आहे. उपासनामंदिरात नेहमी स्त्रियांची संख्या पुरूषांपेक्षा सर्वत्र दुप्पट असतेच, पण कार्यसभेतही ह्यांची संख्या निदान पुरूषांइतकी असते, इतकेच नव्हे, तर प्लॅटफॉर्मवरही ह्या आपले काम दक्षतेने बजावतात. मागच्या वर्षी लंडन येथे युनिटेरिअन वार्षिक सभेत दोघींची भाषणे झाली, तर ह्या वर्षी काही आठवड्यांपूर्वी जी मोठी परिषद भरली होती, तीत चौघींनी स्वानुभवानी जोरदार व मुद्देसूद भाषणे केली. पण केवळ स्त्रियांनीच जे काम आपलेकडे घेतले आहे आणि जे त्या मोठ्या मार्मिकपणे व उमेदीने बजावीत आहेत ते पोस्टल मिशन हे होय. ते काम असे आहे.

प्रमुख युनिटेरिअन आचार्यांचे साधे आणि मनोवेधक उपदेश पुस्तकरूपाने युनिटेरिअन मंडळी प्रसिद्ध करते. त्यांपैकी काहींची प्रथम निवड करून, ह्या बाया कोणाही वाचकांस फुकट आपल्या खर्चाने पाठविण्यासंबंधीच्या जाहिराती, इकडील प्रसिद्ध पत्रांतून आपल्याच खर्चाने देतात. ह्या पत्रांचा युनिटेरिअन मताशी कसलाही संबंध बहुतेक नसतो. संशयाने गांजलेल्या लोकांकडून अगर केवळ काय आहे हे पाहण्याच्या इच्छेने इतरांकडून ह्या पुस्तकांस सहजच मागणी येते. पुस्तक पाठविताना अशी एक लहानशी सूचना करण्यात येते की वाचून काही शंका आल्यास त्यांच्या निरसनार्थही यत्न होईल. शंका कळविल्यास त्याचे समाधान ज्यात मिळेल, अगर समाधान कळविल्यास त्याचे दृढीकरण जेणेकरून होईल अशी दुसरी पुस्तके पाठवितात. त्याबरोबर लहानसे पण सहानुभूतीचे पत्रही जाते. अशा रीतीने सहजच पत्रव्यवहार वाढून, शेवटी आपम युनिटेरिअन आहो असे प्रत्येकास कळून येते. पुस्तके पाठविण्यात विनाकारण घाई अगर मिशनरी लोकांत काही ठिकाणी दिसून येणारा अधाशीपणा न होऊ देण्याची खबरदारी घेतली जाते. पत्रव्यवहारही जिज्ञासूंच्या अनुसंधानानेच चालतो. अशा रीतीने युनिटेरिअन म्हणजे धर्मलंड अगर धर्माभिमानशून्य वगैरे ज्या भ्रामक कल्पना झाल्या असतात, त्यांचा निरास होऊन वाचक युनिटेरिअन मंदिरात उपासनेस जाण्यास राजी झाले, असे दिसल्यावर त्यास त्यांच्या गावांतील युनिटेरिअन मंदिराची वाट दाखविण्यात येते, अगर आचार्यांची ओळख करून देण्यात येते. आतापर्यंत जी मदत पत्र मार्गाने होते ती ह्यापुढे प्रत्यक्ष होऊ लागून लवकरच वाचक झालेल्या उपकाराबद्दल उतराई होण्यास उत्साहपूर्ण युनिटेरिअन होतो.

ही कल्पना मूळ अमेरिकन युनिटेरिअन स्त्रियांत निघाली. ती लंडन येथील स्त्रियांनी उचलली. जाहिराती व टपाल खर्चासाठी लहानशी वर्गणी स्थापून युनिटेरिअन स्त्रियांनी आपल्यातच एक अशी मंडळी बनविली. १८८७ साली एकच मंडळी होती. १८८९ साली ह्या देशातील निरनिराळ्या शहरांत अशा १३ मंडळ्या निघाल्या. हल्ली २३ मंडळ्या असून त्यांचे सभासद वाढतच आहेत. ह्या सर्वांचे एक साधारण संमेलन लंडन येथे आहे. गेल्या तीन वर्षांत ५००० लोकांकडून मागण्या आल्या व त्यास १५००० वर पुस्तके पाठविण्यात आली. अशी पुस्तके वाचून युनिटेरिअन झालेल्यांपैकी काही थोडे आचार्य बनले, बरेच साधारण उपदेशक बनले, कित्येक आदित्यवारच्या शाळेत शिकवू लागले.

त्रैवार्षिक, वार्षिक आणि प्रांतानिहाय युनिटेरिअन समाजाच्या इतर ज्या सभा भरतात त्यांत ह्या मंडळ्याही जमतात. तेव्हा त्या आपल्या कामाचा ऊहापोह करून आपली हकीकत प्रसिद्ध करितात. अशा वेळी जी भाषणे व्हावयाची असतात, ती ते लोक ह्या मिशनच्याद्वारे युनिटेरिअन बनलेले असतात, त्यांच्याकडूनच होतील अशी योजना असते. काही पत्रांचे उतारे वाचतात त्यांचे मासले येणेप्रमाणे:

जुन्या मताचा उपदेशक- ‘मि. बोबीसाहेबांचा उपदेश ऐकल्यापासून मी स्वत:शी युनिटेरिअन आहे की काय असा विचार करीत आहे. तो उपदेश प्रत्येक पीठातून व्हावा असे वाटते..............’

खाणीतील मेथॉडिस्ट मजूर- ‘मार्टिनोसाहेबांचा (..............) हा ग्रंथ वाचण्याची आमची इच्छा आहे. पण विकत घेण्याची शक्ती नाही. आमच्या समाजातील काही जणांची मते तुमच्यासारखीच आहेत. तुमचा समाज तुम्हांला वाटतो त्यापेक्षा मोठा आहे........’

अज्ञेयवादी- ‘तुम्ही मला पाठविलेली पुस्तके वाचून सुमारे १२ जण युनिटेरिअन झाले आहेत......माझे कोडे उकलले......तुम्ही दाखविलेले देवाचे स्वरूप इतके सहज आहे की, त्याचे प्रेम मला अपरिहार्य झाले आहे.’ ह्याप्रमाणे असे हे काम केवळ बायकांनीच मिळून नीटनीटके बिनबोभाट व बिनतक्रार चालविले आहे. पुरूष हकीकत ऐकण्यास मात्र सभेस येतात. लहानमोठ्या पुस्तकांचा साठा मात्र युनिटेरिअन असोसिएशनकडून लागेल तितका खुषीने मिळतो, त्यात काय नवल!

वर मी जी हकीकत दिली आहे, ती केवळ वाचून हर्ष आणि आश्चर्य मानण्याकरिता एक विलायती चुटका पाठविला आहे असे नव्हे. तर हे काम तुम्हांकडूनही होण्यासारखे आहे व होणे जरूर आहे.

मी गेल्या वर्षी एकदा लंडनमध्ये असता ह्या मंडळीच्या मुख्य अध्यक्षबाईस ह्या कामाची माहिती विचारली. प्रत्यक्ष ओळख नसता ह्या बाईने मला आणि मुख्य सेक्रेटरीबाईला आपले घरी भेटविले आणि दोघांनी मोठ्या आनंदाने व अगत्याने मला सर्व माहिती करून दिली. लगेच आमचे बंधू रा. सुखटणकर ह्यांनी हे काम आपल्या अंगावर घेतले व आतापर्यंत अनेक अडचणी सोसून तिकडे हे काम चालविले आहे पण आता त्यांना इकडे येणे आहे.

हे काम खरोखर स्त्रियांनाच योग्य आहे, आणि स्त्रियांना खरोखरी तूर्त हेच काम आहे, हे इकडच्या अनुभवावरून निर्विवाद आहे. आर्य महिला-समाजात तुमच्यापैकी कित्येकींनी निबंध वाचलेले ऐकिवात आहे. असे निबंध वाचण्यापेक्षा वरील पोस्टल मिशनची दोन चार ओळींची पत्रे लिहिणे विशेष अवघड आहेसे वाटत नाही. उलट फायदा मात्र पुष्कळ होईल. ह्यावरून आर्य महिला-समाज बंद करा असे माझे म्हणणे नाही, तर त्यात एक तुमचेच पोस्टल मिशन वरील धोरणावर काढा अशी विनंती आहे. रा. सुखटणकर तेथे आहेत तोपर्यंत आपल्या अनुभवाचा फायदा तुम्हांला अगदी आनंदाने देतील. ह्या कामाला मोठी एक परिषद भरविली पाहिजे असे नाही. हे काम बोभाट्याचे अगर भपक्याचे मुळीच नव्हे तर तुम्हांला शोभेल अशा मर्यादेचे आहे. दिवाणखान्यात पडद्याआड बसून मुलांस खेळवीत खेळवीतही तुम्ही हे काम उरकू शकाल. प्रत्येक पोस्ट-मास्तर व पोस्टाचा शिपाई तुम्हांस बेमालूम मदत करील-करणे भाग आहे. जिज्ञासूंची उणीव आहे म्हणावे, तर तसेही नाही. आज हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांतून कित्येक तरूण विद्यार्थ्यांची पत्रे लंडन येथील सेक्रेटरीबाईकडे येत आहेत. ती बाई ती पत्रे मजकड पाहण्यास पाठविते. घरच्याघरी तेथे तुम्ही हे काम पत्करल्यास किती सोय होईल!

युनिटेरिअनांचा, आमचा व इतर सर्वांचा देव एकच आहे. सर्वांच्या अंत:करणातल्या ख-या गरजा व वेदना एकच आहेत. म्हणून ह्याबाबतीत तुम्हांला इंग्रजीत जितक्या म्हणून वाड्मयाची गरज पडेल तितके सर्व इकडील तुमच्या बहिणींकडून मोठ्या आनंदाने पुरविण्यात येईल. येशू ख्रिस्त किती जरी चांगला मनुष्य होता अशी इकडे ह्यांची समजूत आहे, तरी आमच्या लोकांनी त्यांचेच गोडवे गावे अशी ह्यांची कोती इच्छा नाही. आधुनिक विचारपद्धतीस पूर्ण पटतील अशीच केवळ ईश्वरविषयक पुस्तके लागतील तितकी पाठवतील. इतकेच नव्हे तर आफ्रिकेतून काही मुसलमान लोकांकडून पत्रे आली आहेत, त्यांच्यासाठी राजा राममोहनराय ह्यांनी मागे मुसलमानांसाठी कुराणासंबंधी काही लेख लिहिलेले उपलब्ध आहेत काय म्हणून अध्यक्षबाई मिस् टॅगर्ट हिने मला परवा लंडन येथे विचारले. ते लेख मिळतील तर इकडे छापून निघण्यास अडचण पडणार नाही. ह्याचप्रमाणे आमचे पुढारी केशवचंद्र व प्रतापचंद्र इत्यादिकांचेही लहानलहान लेख रा. सुखटणकरांनी तिकडे छापून ह्याच कामासाठी काढिले आहेत. सवडीप्रमाणे व मदतीप्रमाणे मराठी पुस्तकांचीही ह्यात भर पडत जाईल.

म्हणून आमच्या समाजातील तुम्हा सर्व बहिणींस-खुशी असल्यास बाहेरच्यासही-अशी अगत्याची विनंती आहे की रा. सुखटणकर हे हिंदुस्थान सोडण्यापूर्वी तुम्ही आपल्यात एक पोस्टल मिशन स्थापावे. प्रथम प्रथम जड गेल्यास एका-दोघांकडून मदत घ्यावी. पुष्कळ जी जमण्याची जरूरी नाही. एक अध्यक्ष, एक खजिनदारीण आणि खरोखर झटून काम करणारी एक सेक्रेटरी मिळाल्यास पुरे. सर्व काही ह्या एकीवरच अवलंबून आहे. टपालखर्च भागविण्यास इतर वर्गणीदार स्त्रिया मिळतील तितक्या थोड्याच.

इतर पाल्हाळ लिहिण्याची गरज नाही. सार्वजनिक कामे करण्याचा स्त्रियांना हक्क आहे व त्यांच्यात शक्तीही आहे अशा अर्थाचे बरेच लेख सुधारकांनी लिहिले आहेत व तुम्हांस ते पटले आहेत. हे एक लहानसे काम घरी बसूनच होणारे आहे. त्याचा विचार व्हावा.

  1. समाजसेवेचीं मूलतत्त्वें
  2. संसारसुखाची साधने
  3. संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
  4. संग व विषय
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
  • 97
  • 98
Page 94 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी