1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

विनययोग

(रविवार ता. १९ व ता. २६ जून १९१० रोजीं मुंबईच्या प्रार्थनामंदिरांत केलेला उपदेश.)

अलीकडे नीति आणि धर्मशिक्षण ह्यांची चोहोकडे मोठी हूल उठली आहे. ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधी आमच्या राष्ट्रामध्ये जागृती होत आहे, ही बरी गोष्ट आहे. पण अशा सनातन विषयाचा ऊहापोह केवळ प्रासंगिक कारणावरून आणि आनुषंगिक हेतून हल्लीच्याप्रमाणे होत आहे ही मात्र त्यातल्या त्यात गौण गोष्ट आहे. म्हणून आपण हे लक्षात आणून आपल्या मनावर जे काही प्रासंगिक आणि तात्पुरते संस्कार झाले असतील ते दूर सारून अगदी निर्लेप अंत:करणाने ह्या विषयाकडे वळूया.

मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे शील ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. खाणीतून जसा दगड काढावा तसा हा मनुष्य ह्या सृष्टीत निर्माण होत नाही. अनेक अज्ञात आनुवंशीक कारणांनी मनुष्याच्या मनामध्ये संचिताचे ठसे जन्मत:च उमटलेले असतात. ह्या ठशामुळे मनुष्याच्या व्यक्तिस्वभाव बनलेला असतो. ह्या स्वभावाचा विकास आणि रूपांतरे व्यक्तीला स्वप्रयत्नांनी तिच्या भावी शीलामध्ये करावयाची असतात. ह्यावरून स्वभाव हा ईश्वरदत्त वारसा आणि शील ही स्वकष्टार्जित मिळकत असे म्हणावयास हरकत नाही. कारागिराने तयार केलेला विणा आणि गायनाच्या पूर्वी गवयाने लावलेला विणा ह्यांमध्ये जो फरक आहे, तोच स्वभाव आणि शील ह्यांमध्ये आहे. गायन व्हावयाचे असल्यास गवयास बराच वेळ आपल्या वाद्याची जुळवाजुळव करावयाची असते. लाकडाचा गुण, भोपळ्याचा गुण, तारांचा गुण इत्यादिकांची जोड कारागिराने केलेली असते. ती त्या विण्याचा एक स्वभावच म्हणावयाचा; पण गवयाने एवढ्याने भागत नाही. त्याला प्रसंगानुसार व आपल्या आवाजाच्या आटोक्याप्रमाणे तारा कमीअधीक खेचाव्या लागतात. मृदंगाचे तंग ताणावे लागतात. ह्यास त्या विण्याचे शील म्हणता येईल. तद्वतच व्यक्तीलाही आपल्या उपजत मानसिक गुणांची ओढाताण ह्या जगिक व्यवहारात करावी लागते. गवयाचाही गाण्यापेक्षा केव्हा केव्हा विणा लावण्यातच जास्त वेळ जातो, तर संसारातील साधकास आपले व्यवहारोपयोगी शील पूर्ण बनविण्यास पुष्कळ दिवस आणि पुष्कळ अनुभव सोसावे लागतात ह्यात नवल ते काय? शिवाय, संसारात व्यवहार करणे म्हणजे नुसते विणा लावून ठेवण्याप्रमाणे नाही, तर त्या विण्याच्या साहाय्याने आपल्या स्वरांचे आलाप काढून गवई ज्याप्रमाणे श्रोत्यांच्या मनामध्ये निरनिराळे इष्ट भाव उत्पन्न करतो त्याप्रमाणे सांसारिक जनांसही इतरांस निरनिराळ्या प्रकारचे शासन अथवा वळण द्यावयाचे असते.

ह्यावरून आपल्या शीलाचे अथवा चारित्र्याचे दोन मुख्य भाग होतात हे उघड आहे. एक आपण दुस-याशी कसे वागावे हा आणि दुसरा दुस-यास कसे वागवावे हा होय. आपल्या विषयविवेचनाच्या सोयीसाठी पहिल्या भागास आपण विनययोग म्हणू आणि दुस-यास शासनयोग हे नाव देऊ. शासनयोगाचा विचार पुढे केव्हा तरी करता येईल. आज विनययोगाचे विवेचन करू. गवई आपले गाणे सुरू करण्यापूर्वी प्रसंगाला अनुलक्षून विवक्षित रागदारीची योजना करून प्रसंगातील रसानुरूप आपल्या मनाची भावना करून गाणे गाऊ लागतो, त्याप्रमाणेच ह्या जगामध्ये मार्गक्रमण करू इच्छिणा-यांनी आपली मनोभावना ठरवून तदनुरूप विनययोग साधावा ही भावना कशी असावी ह्याविषयी भगवान श्रीगौतमबुद्धांनी आपल्या विनयपीठकामध्ये स्पष्ट सांगितले आहे:

अतूपमाय सब्बेस सत्तानं सुखकामतम्|
पस्सित्वा कमतो मेत्तं सब्बसत्तेसु भावये||

[आपल्याप्रमाणेच सर्व प्राणिमात्र सुखाची इच्छा करितात, असे जाणून क्रमक्रमाने त्या सर्वांविषयी प्रेमभाव उत्पन्न करावा.]

सुखी भवेय्यं निदु:क्खो अहं निच्चं अहं विय|
हिताच मे सुखी होन्तु मज्झता चथ वेरिनो||

[सदासर्वदा मी सुखी असावे, मी निर्दु:खी असावे, माझ्याप्रमाणे माझे मित्रही सुखी होवोत, मध्यस्थही सुखी होवोत आणि माझे वैरीही सुखी होवो.]

हमह्मि गामक्खेत्ताह्मि सत्ता होन्तु सुखी सदा|
ततो परं च रज्जेसु चक्कवाळेसु जंतुनो||

[ह्या आसपासच्या देशातील आणि ह्या गावातील सर्व प्राणी सर्वकाळ सुखी होवोत. ह्या राज्यातील प्राणी सुखी होवोत. ह्या विश्वातील (सर्व) प्राणी सुखी होवोत.]

तथा इत्थी पुमा चेव अरिया अनरियापि च|
देवा नरा अपायठ्ठा तथा दसविदासु च||

[त्याचप्रमाणे स्त्रिया आणि पुरूष, आर्य आणि अनार्य, देव आणि मनुष्य हे सर्व सुखी होवोत. दुर्गतीप्रत गेलेले प्राणीही सुखी होवोत. दाही दिशांला सर्व प्राणी सुखी होवोत.]

बुद्ध देवांनी वर सांगितल्याप्रमाणे मनुष्यमात्रांनी ह्या जगामध्ये आपली सुखाची आणि मैत्रीची भावना सदोदित ठेवावी असे सांगितले आहे. ही भावना पुढील सर्व विनययोगाचा पाया होय. वरील श्लोकात गौतमाने तीन गोष्टी सांगितल्या आहेत :

(१) आपण नेहमी सुखी असण्याचा प्रयत्न करावा. दु:खी राहण्यात कोणताही धार्मिकपणा किंवा मोठेपणा नाही. (२) दुस-यामध्येही हीच सुखवृत्ती वाढवावी. (३) सर्वांमध्ये सर्वकाळ आणि दशदिशा हे सुखाचे वर्तुळ पसरावे.

हे करण्यास खालील मार्ग साधावा :- (१) आपल्यामध्ये काही उपजतच दुर्गुण असतात आणि आपण जन्मल्यावर आपल्या अज्ञानामुले किंवा दुर्बलतेमुळे काही दुष्कृत्ये आपल्या हातून होतात. ह्या संचित दुर्गुणांपासून आणि क्रियमाण दुष्कृत्यांपासून जर आपली खरी सुटका व्हावयाची असेल तर हे दुर्गुण आणि ती दुष्कृत्ये आपण होऊनच उघडकीस आणिली पाहिजेत. ह्यासाठीच कित्येक धर्मांमध्ये स्वकृत पापनिवेदनाची (Confession) आणि प्रायश्चित्ताची योजना असते आणि ही अवश्य आहे. अशा रीतीने आपणच आपल्या दुर्गुणांचा आणि दुष्कृत्यांचा पुकारा केल्यास दुस-यास ती उघडकीस आणण्यास वावच उरणार नाही आणि उभयपक्षी बरीच तळमळ निवारली जाईल. (२) पण सर्वच काळ आपण आपल्या पापाचा पुकारा करीत राहणे हे व्यवहारात शक्य नसते. अशा वेळी निदान आपण आपली दुरिते अन्य कोणत्या रीतीने उघडकीस येत असली तर लपविण्याचा तरी निदान प्रयत्न करू नये. जो जो छपविण्याचा जास्त प्रयत्न होतो तो तो ती उघडकीस आल्यावर जास्त क्लेशकारक होतात. (३) तसेच आपले काही संचित सदगुण आणि क्रियमाण सत्कृत्येही असतात. ती आपण नेहमी छपविण्याचा प्रयत्न करावा. आपल्यास ज्ञान अथवा कला प्राप्त झाली तर किंवा एकादा नवा शोध लागला असता तर तो छपविण्याचा प्रयत्न करू नये. पण सत्कृत्याची गोष्ट निराळी. (४) हे सदगुण आणि ही सत्कृत्ये सर्वकाळ लपवून ठेवणे शक्य नसले तरी ती निदान आपण होऊन उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रयत्नाने ती कमी परिणामकारी होतात. (५) आपले दुर्गुम आणि दुष्कृत्ये ही ज्याप्रमाणे उघडकीस आणावी त्याचप्रमाणे उलटपक्षी दुस-याचे दुर्गुण आणि दुष्कृत्ये नेहमी छपविण्याच प्रयत्न करावा. जेव्हा कारणच पडेल, किंवा अशा रीतीने दुस-याची दुष्कृत्ये उघडकीस आणणे ही आपली सार्वजनिक नेमलेली कामगिरी किंवा नैतिक कर्तव्य असेल तेव्हाच आणि तेव्हाही ती मोठ्या नाइलाजाने आणि अनुकंपेने उघड केली तरच आपल्यास कर्तव्य बजाविल्याचे श्रेय मिळून दुस-याचे हित होते. (६) एरवी दुस-याची दुरिते सर्वकाळ छपविणे शक्य नसले तरी ती आपण होऊन उघडकीस आणण्याची वरील कारणाशिवाय कधीही उठाठेव करू नये. (७) तसेच दुस-याचे सदगुण आणि सत्कृत्ये ही होता होईल तो उघड करण्याचा प्रयत्न करावा. (८) ती निदान छपविण्याचा प्रयत्न करू नये.

विनययोगाचा असा अष्टांगमार्ग आहे. त्या मार्गाने वर गौतमबुद्धांनी उपदिष्ट केलेल्या मैत्रीभावनेची चिरकाल वृद्धी होवो.

विनययोगाची मीमांसा करताना आपल्या आणि दुस-याच्या चांगल्या आणि वाईट गुणांसंबंधी आणि कृत्यासंबंधी आपली वृत्ती कशी राखावी ह्याविषयीच्या अष्टांगमार्गाचे दिग्दर्शन वर केले. आज आपल्यावर आणि दुस-यांवर सुखाचे आणि दु:खाचे जेव्हा प्रसंग येतात त्या त्या वेळी आपली वृत्ती कशी राखावी ह्याविषयी विचार करू.

सुखाचा आपल्यावर एकादा व्यक्तिविषयक प्रसंग आला तर त्याविषयी सूज्ञ माणसाने आपल्या मित्राजवळ देखील वाच्यता करीत बसू नये, ते सुख कोणत्याही दर्जाचे असो, ते जर केवळ आपल्या व्यक्तिपुरते असेल तर दुस-यांनी वाटल्यास आपले अभिनंदन करावे आणि तेव्हाही आपण होता होईल तो थोडक्यात त्यांचे आभार मानून मोकळे व्हावे, हाच सुविनितपणा होय. पण कित्येक अभिनंदनाची वाटही न पाहाता आपल्या व्यक्तिसुखाचा पाल्हाला लावितात आणि ह्यात अविनय आहे हे त्यास कळत नाही. समुद्रकिना-यावर हिंडत असता आपल्या चिमुकल्याला एकादे फुटके शिपले सापडले आणि त्याबद्दल मोठा उल्हास दाखवीत तो आपल्याकडे आला तर आपण त्याच्या उल्हासाचे कौतुक करणे साहजिक आहे. परंतु जगामध्ये सर्वच ठिकाणी माणसाचा संबंध पितापुत्राचा नसतो आणि एकाच्या व्यक्तिसुखाचे कौतुक दुसरा करीलच ह्याचा नियम नाही.

आपल्यावर दु:खाचा प्रसंग येतो, तेव्हाही मनुष्याने आपल्या तोंडाला ‘दृढतर मौनकुलुपच’ लाविले पाहिजे. त्यासंबंधाने हळहळ किंवा हायहाय दुस-यापुढे करणे हे दुर्बलपणाचे लक्षण आहे. पुरूष अथवा स्त्री ज्या मानाने दुबळी असते त्या मानाने ही हळहळ आणि हायहाय अधिक दिसून येते. आपली खासगी दु:खे दुस-यास सांगून तादृश फायदाही होत नाही, असा पुष्कळ वेळा आपणांस अनुभव येतो. आपली दु:खाची कहाणी संपण्याची तर गोष्ट दूरच राहो, पण ती सुरू होते न होते तोच ऐकणारा आपल्या स्वत:ची दु:खे सांगू लागतो आणि ती इतका वेळ सांगत बसतो की, त्यामुळे आपण आपले दु:ख सांगितले ह्याबद्दल आपणांस पश्चात्तापच व्हावा असा कित्येकांना तरी अनुभव आला असेल. यद्यपि दुस-याने स्वत:ची दु:खे न सांगता आपली सर्व दु:खे ऐकून घेतली तरी त्यास ती ऐकून बरे वाटते असेच नेहमी होते असे नाही. शिवाय जरी आपल्या मित्रामध्ये आपणाविषयी अनुकंपा उत्पन्न होण्याचा संभव असला तरी हलक्यासलक्या प्रसंगी आणि वेळोवेळी हा संभव कसास लावून पाहणे हे योग्य नाही.

आपण आपली दु:खे दुस-यास सांगू नये इतकेच नव्हे, तर आपल्या व्यक्तिविषयक व घरगुती गरजा ह्यांचीही चर्चा विनाकारण कधीही न करण्याची जितकी खबरदारी घेववेल तितकी हितकारक आणि भूषणास्पद आहे. ह्याबाबतीत गंभीर मौन धारण केल्याने आपल्या गरजा जितक्या लवकर भरून येतील तितक्या वाच्यतेने भरून येणार नाहीत आणि त्या गरजा आपल्या प्रयत्नाच्या जोरावर भरून काढण्यात स्वत:स भूषण आणि इतरांस शिक्षण जितके मिळेल तितके आपल्या ख-या मित्रांच्या अकंपेनेही मिळणार नाही. ह्यावरून मित्रांच्या सहानुभूतीची किंमत कमी होते असे नाही. उलट तिचे प्रसंग अधिकाधिक कमी झाल्याने तिचे मोल अधिक वाढेल ह्यात संशय नाही. सहानुभूती मुळीच अनावश्यक किंवा अनिष्ट आहे असे नाही, ती अति स्वस्त होऊ नये एवढाच विनयाचा उद्देश आहे.

पण अलीकडे आपल्या राष्ट्रात काही बाबतीत उलटाच प्रकार चाललेला दिसतो. आपल्याला विवाह करावयाचा असल्यास ‘वधू पाहिजे’ अशी जाहिरात वर्तमानपत्रात देणारी मंडळी जेथे आढळते तेथे विनयाची भवति न भवति करीत बसणे हे कदाचित अरण्यरूदनासारखे होणार आहे. स्वयंवराची चाल आपल्या राष्ट्रात पूर्वी असो किंवा नसो, ती काही पाश्चात्य देशांमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे, पण तेथेही वर्थमानपत्राच्याद्वारे स्वयंवर करण्याची पद्धती अद्याप चालू झाली नसता आमच्यासारख्या पुराणप्रिय लोकांनी ती इतक्या लवकर उचलली ह्यास काय म्हणावे! मर्यादा राखण्याविषयी आमची प्रसिद्धी असून असे का व्हावे? ज्याप्रमाणे आम्ही आपली अंगे वस्त्रांनी झाकावी त्याचप्रमाणे आम्ही आपल्या खासगी गरजाही झाकाव्या. निदान विनाकारण चव्हाट्यावर पाठवू नये ही खरी मर्यादा आहे.

ह्याप्रमाणे आम्ही आपल्या खासगी सुखदु:खाची चर्चा दुस-यापुढे वेळी अवेळी करू नये असे म्हटले, ह्यावरून आम्ही दुस-यांची सुखदु:खे ऐकू नयेत असे होत नाही. ह्यावर कदाचित असा आक्षेप येईल की जर आम्ही दुस-यास सांगू नयेत तर दुस-यांनीही आम्हांस सांगू नये हे योग्य, आणि जर आम्ही ऐकू तर दुस-यांस सांगावयास उत्तेजन दिल्याप्रमाणे होणार; म्हणून आपण ऐकण्याचेही वर्ज्य करावे हा उत्तम मार्ग; पण हा आक्षेप योग्य नाही. दुस-यास विनय शिकवावयाचा तो आपल्या विनयानेच चांगला शिकविला जाईल. आम्ही स्वत:च्या दु:खाची चर्चा कधीच न करून उलट दुस-यांची सुखदु:खे ऐकावयास तयार आहो हे ध्यानात येऊन दुसरे जितके लवकर विनयवान होतील तितक्या लवकर आम्ही त्यांच्या कहाणीचा अनादर केल्याने होणार नाही. उलट आम्ही कठोर अंत:करणाचे आहो असा मात्र दुस-यांचा गैरसमज होईल. शिवाय प्रसंगविशेषी परस्पर सहानुभूती अवश्य-निदान इष्ट आहे असे पूर्वी सांगितलेच आहे.

आतापर्यंत आमच्या साधारण लौकिक सुखदु:खाचा विचार झाला, पण ह्याशिवाय आपल्यास आध्यात्मिक सुखदु:खाचा अनुभव येतो. त्याविषयी आपली वागणूक वरच्याहून अगदी वेगळी असली पाहिजे. ती कधीच आम्ही आपल्याशी झाकून ठेवू नये. योग्य अवसर पाहून त्याचा फायदा दुस-यास द्यावा. आध्यात्मिक दु:खे तीन प्रकारची असण्याचा संभव आहे. पहिला प्रकार कृतकर्माबद्दल केव्हा केव्हा आपणास होणारा पश्चात्ताप होय. केव्हा केव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनक्रमात निराशा वाटू लागते, हा दुसरा प्रकार व केव्हा केव्हा आपल्या अत्यंत प्रिय आदर्शासंबंधीदेखील संशय उत्पन्न होतो. ह्या तीनही अनिष्ट प्रकारांमुळे आपल्यास थोर वेदना आणि यातना होतात. त्यावेळी आपल्या वडील माणसांजवळ किंवा सुहृदजनांजवळ विसावा, शांती आणि नवीन मार्ग शोधण्यास आपण अवश्य जावे. श्रद्धादृष्टीने पाहता वरील तीनही अनिष्ट प्रकार अंती आपल्यास हितावहच होतात. मात्र एवढी सावधगिरी घेतली पाहिजे की, अशा प्रसंगी आम्ही लपवालपव किंवा उडवाउडव न करता मन अगदी आरशाप्रमाणे मोकळे ठेवावे आणि आपल्या शत्रूसही आत येण्यास द्वार खुले करावे. पण जनरूढी पाहता लोक साधारणत: अशा प्रसंगी अनुभव नसताना उगीच पोकळ सुखवादाच्या आणि आशावादाच्या गोष्टी सांगत असतात. आध्यात्मिक बाबतीत असा औपचारिकपणा करू नये. आपल्या मनास संशयाचा स्पर्श झाला किंवा त्यावर निराशेची छाया पडली की आम्ही खात्रीने अपवित्रच झालो असे समजू नये. केव्हा केव्हा प्रामाणिक संशयाची योग्यता आणि पवित्रता प्रामाणिक श्रद्धेइतकीच असते, मग ती अंधपरंपरागत श्रद्धेहून अधिक आहे हे सांगावयास नकोच. संशय ही मनोविकाराची एक पायरीच आहे, इतकेच. ह्या पायरीवर पोहोचलो असतो तेथेच थबकण्याची किंवा खाली पाहण्याची चुकी करू नये. कोणी आसपासचा सांगाती किंवा कोणी वरच्या पायरीवरचा गुरू ह्यांची कास धरण्यास धावावे. अशा संशयस्थितीचा संसर्ग आपल्याहून कमी अधिकाराच्या माणसास न लागेल अशी खबरदारी घ्यावी.

विठ्ठल रामजी शिंदे बी. ए., यांचें त्रोटक चरित्र

ज्यांचे लेख, व्याख्यानें व उपदेश ह्या संग्रहांत समाविष्ट केले आहेत, ते माझे मित्र, रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, आजच्या काळचे एक तरुण कर्ते गृहस्थ आहेत. त्यांच्या हातून आजपर्यंत, जी लोकसेवा झाली आहे, व आज जी होत आहे, तिचेपेक्षां अधिक लाभदायक सेवा पुढें होणारच आहे; आणि ती करावयास त्यांस परमेश्वरानें दीर्घायु करावें, त्यांस नेहमी त्यानें साहाय्य करावें, अशी विनम्र भावें प्रार्थना करून त्यांच्या चरित्रांतील कांहीं विशेष गोष्टींचा येथें उल्लेख करितों.                                          
पूर्व-वृत्तान्त.    

आमच्या  ह्या  लहानशा  चरित्रासाठीं  रा. विठ्ठलरावांच्या  पूर्वजांची  सविस्तर  हकीकत  येथें  देण्याची आवश्यकता नाहीं व ती उपलब्धही नाहीं. शिंदे हें नांव मराठ्यांचें असून विठ्ठलरावांच्या तीर्थरूपांचें नांव रामजी बसप्पा कसें?  याचा उलगडा पुष्कळांस सहज होण्यासारखा नाहीं. जीं नांवें विशिष्ट धर्मवाचक असतात, त्यांचा स्वीकार तो धर्म मान्य नसणारे सहसा करीत नाहींत. बसप्पांचे वडील एका लढाईंत पडले व हे उघडे पडले. त्यावेळीं जमखिंडीच्या कानडी देसायांनीं बसप्पाला आपल्यापाशीं ठेविलें. त्यांचें मूळचें नांव काय होतें तें कळावयास मार्ग नाहीं. ह्या लहान मुलानें आपल्या लिंगाईत धर्माचा स्वीकार करावा असें देसायास वाटत होतें; परंतु बसप्पांस हा विचार बिलकूल पसंत पडला नाहीं. त्यांस मराठा म्हणवून घेणेंच पसंत पडलें. ह्यांनीं अल्प वयांत हा जो करारीपणा दाखविला, तो विठ्ठलरावांचे तीर्थरूपामध्यें पुष्कळ उतरला होता, व त्याचाच अंश रा. विठ्ठलरावांमध्यें आढळून येतो !  पुढें बसवंतअप्पांनीं बराच जमीनजुमला  केला व सुखानें कालक्रमणा करूं लागले.
विठ्ठलरावांचे तीर्थरूप रामजी ह्यांच्या शिक्षणासंबंधानें जी माहिती आहे, तिच्यावरून जुन्या काळाच्या मानानें त्यांचें शिक्षण फार उत्तम रीतीनें झालें होतें, असें म्हणावयास हरकत नाहीं. त्यांना प्रथमतः संस्थानच्या स्टोअर्सच्या कामावर व नंतर पागेच्या कामावर नेमिलें. आजपर्यंत हा मान मराठा गड्यास मिळालेला नव्हता. तो रामजी बावांना देण्यांत आला, त्यावरून त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची जुन्या पद्धतीनें काम करण्याची रीत, त्यांचा करारीपणा, त्यांची तें काम करण्याची पात्रता, ह्यांविषयीं संस्थानच्या अधिपतींची चांगलीच खात्री झाली असावी असें उघड होतें. जमखिंडी येथें त्यावेळीं कोणाही मराठ्याकडे कारकुनी नसल्यामुळें, ह्यांचें व ह्यांच्या वरिष्ठांचें पटत नसे. त्यामुळें रामजीबावांनीं तीन वेळा राजीनामा दिला व तिन्ही प्रसंगीं त्यांस मागाहून बोलावण्यांत आलें. तिस-या प्रसंगीं, घरीं सोळा वर्षें बसल्यानंतर ते आपल्या कामावर रूजू झाले.
रा. विठ्ठलरावांचे धर्मपर लेख व व्याख्यानें ह्या पुस्तकांत संग्रहित केले आहेत. असे लेख लिहावयास व अशीं व्याख्यानें द्यावयास त्यांच्याठिकाणीं जी पात्रता आली, तिचा उगम त्यांच्या मातापितरांच्या धार्मिकतेंत झाला आहे, असें मला वाटतें. रामजी बावांचें धर्माकडे फार लक्ष असे. अगदी जुन्या वळणांतले ते, व त्या वळणास अनुसरून त्यांनीं धर्मग्रंथ वाचलेले, परंतु स्वतः तुकारामाच्या अभंगांचा संग्रह करणें, ते लिहून ठेवणें, त्यांचें मोठ्या भक्तिभावानें पारायण व निरूपण करणें, हा त्यांचा क्रम नित्य चालू असे. ते वारकरी संप्रदायापैकीं असत. जमखिंडीस तुकारामाच्या पुण्यतिथीनिमित्त जो सप्ताह बसत असे, त्यांत मुख्य भाग रामजी बावांचा असे. शिवाय साधु, संत, गोसावी, फकीर ह्यांस रामजी बावांच्या घरांत मज्जाव नसे. त्यांना जेवावयास, खावयास, गांवांत कोठेंही मिळालें नाहीं, तरी तें रामजीबावांकडे हटकून मिळावयाचें ! आणि ह्या पाहुणे मडळींत नीच मानिलेल्या जातींतीलही लोक असत, पण त्यांचाही आदरसत्कार रामजी बावांच्या घरीं इतर पाहुण्यांप्रमाणेंच होत असे. त्यांच्याशीं पंक्तिप्रपंच होत नसे. एवढेंच नव्हे, तर त्यांची पत्नी सौ. यमुनाबाई ह्याही, पतीस जें कार्य प्रिय, त्यांत पुढाकार घेऊन पाहुण्यांचा आदर-सत्कार करीत. विठ्ठलरावांच्या ठिकाणीं अत्यंजांविषयीं प्रेम उत्पन्न झालें व  तें त्यांनी वाढीस लाविलें, ह्या गोष्टी ख-या आहेत; पण त्यांच्या घराण्यांत ही गोष्ट अपूर्व नाहीं; एवढेंच नव्हे तर, निराळ्या दृष्टीनें आईबापांकडूनच त्यांना ह्या बाबतींत पहिला धडा मिळाला, असें म्हणणें वस्तुस्थितीस धरून होईल असें मला वाटतें. सौ. यमुनाबाई ह्या अगदीं जुन्या वळणांतल्या. फार, श्रद्धाळु, अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या, आपल्या मधुर भाषणानें आपल्याकडे कोणाचेंही चित्ताकर्षण करून घेणा-या, आनंदी, पतिसेवा-परायण, अत्यंत दुःखाच्या प्रसंगींही धैर्यानें वागणा-या व आपल्या यातनांस, दुःखास विसरून वागणा-या होत्या. रामजी बावांनीं नोकरी सोडल्यानंतर सगळ्या घराण्याची इभ्रत ह्या शांत व प्रेमळ बाईनीं राखली ! रामजी बावांनीं आपले पैसे लोकांना उसने व कर्जाऊ देऊन घालविले, आणि वर, राजीनामा देण्यापूर्वी सरकारांत आपल्या नांवें असलेले पैसे परत न घेतां उपरणें झाडून ते मोकळे झाले ! अशा वेळीं आपली पूर्वींची इभ्रत, पूर्वींची स्थिति, ह्यांस अनुसरून संसार चालविणें हें यमुनाबांईस किती कष्टाचें कार्य झालें असलें पाहिजे, याची कल्पना वाचकांनींच करावी. पण, त्यांनीं आपली शिकस्त करून आपल्या पतीचा संसार चालविला. एक वेळच्या अन्नावर राहण्याची पाळी आली, तरी खेद न मानतां त्यांनीं आपल्या प्रेमानें सर्वांस जणूं काय भारून टाकिलें !

(* हा लहानसा चरित्रात्मक लेख रा. शिंदे ह्यांच्या एका मित्रानें लिहिला आहे.)
संपादक.

जन्म व शिक्षण.

अशा प्रकारची विपन्नावस्था येण्यापूर्वीं म्हणजे इ. स . १८७३ सालीं ता. २३ एप्रिल रोजीं जमखिंडी येथें रा. विठ्ठलराव यांचा जन्म झाला. त्यांच्या वयाचीं पहिलीं सहा वर्षें खाऊन पिऊन सुखांत गेलीं. नंतर कालचक्राचा फेरा आला ! तेव्हां लहानपणापासून हालामध्यें दिवस काढण्याची त्यांना संवयच जडली असल्यामुळें, आतां ते अडचणींस न जुमानतां आपला मार्ग पुढें काढीत जात असतात ! विठ्ठलरावांचें प्राथमिक शिक्षण व पुढें इंग्रजी शिक्षण जमखिंडीस झालें. प्राथमिक शिक्षण चालू असतांनाच, नोकरी नसलेल्या रामजी बावांनीं आपल्या स्वतःच्या मुलां-बाळांनीं भरलेल्या घरांत सहा महिन्यांची सून आणिली !  रामजीबावा हे जमखिंडी येथें मराठा जातीचे मुख्य पंच असल्यामुळें, विठ्ठलरावांचे हें लग्न कर्ज काढून त्यांना साजरें करावें लागलें, व त्याच कर्जाचा बोजा पुढें वाढून आपत्ति भोगाव्या  लागल्या.  विठ्ठलरावांचें शिक्षण आपल्या गांवीं ब-या रीतीनें  झालें. त्यांची कुशाग्र बुद्धि, त्यांची शिकण्याची हौस व त्यांचें अभ्यासावरील लक्ष, ह्यांमुळें ते आपल्या शिक्षकांस फार प्रिय झाले; व अखेरीस आपल्या गांवांतील परशुराम भाऊ हायस्कुलांतून ते सन १८९१ सालीं प्रवेश परीक्षा पसार झाले. वरच्या इयत्तेंत असतांनाच मुलांच्या Debating Society  सारख्या संस्था स्थापून तेथें ते पुढाकार घेत व त्याच वेळीं सगळ्या मुलांवर त्यांची छाप असे, असें दृष्टोत्पत्तीस आलें होतें. विठ्ठलरावांच्या शिक्षणाचा ग्रंथ येथेंच आटोपावयाचा;  आणि त्यांच्यासारख्या विपन्नावस्थेंतील मुलाचें आणखी शिक्षण होणें ही कांहीं सहजसाध्य गोष्ट नव्हती. पण, त्यांचें पुढलें शिक्षण व्हावयास जमखिंडी संस्थान अप्रत्यक्षरीत्या कारण झालें आहे. म्हणजे शिक्षणासाठीं संस्थानानें मदत जरी केली नाहीं, तरी संस्थानाधिपतींच्या विलक्षण हुकुमामुळेंच विठ्ठलरावांनीं जमखिंडी सोडली.

प्रवेश परीक्षा झाल्यानंतर जेथें त्यांचें शिक्षण झालें, तेथेंच त्यांना शिक्षकाची जागा मिळाली. त्यामुळें त्यांच्या मातापित्यांना मोठा आनंद वाटला व आपल्या मुलाविषयीं त्यांना मोठा अभिमान वाटूं लागला; व शिक्षकांसही, आपल्या आवडत्या शिष्यानें आपल्याच शाळेमध्यें शिक्षक व्हावें ही गोष्ट, असाधारण वाटली. स्वतःविठ्ठलरावांना शिक्षकाचें काम मनापासून आवडतही असे, पण, असा हुशार मनुष्य शाळेंत राहण्यापेक्षां त्यानें स्कॉलरशिप घेऊन मुंबईंत व्हेटरनरी कॉलेजांत जाऊन अभ्यास करावा व नंतर त्यानें जनावरांचे डाक्टर बनावें, असें संस्थानिकांच्या मनानें घेतलें ! पण ही गोष्ट संस्थानिकांच्याच मनानें घेऊन होणारी नव्हती. सरकार स्कॉलरशिप द्यावयास तयार आहे तर, तीच स्कॉलरशिप पुण्यास आर्टस् कॉलेजांत अभ्यास करण्यासाठीं आपल्याला मिळावी, असा सरळ जबाब विठ्ठलरावांनीं दिला. हें कालचें पोर आपल्या इच्छेच्या  आड जावयाची हिय्या करीत आहे असें पाहून, आपला असा अनादर झाला, अशी मनाची समजूत करून घेऊन विठ्ठलरावांस संस्थानिकांनीं नोकरीवरून दूर केलें, व त्याच रागांत त्यांच्या वडिलासही कामावरून दूर केलें; व ह्या गोष्टीमुळें विठ्ठलरावांच्या पुढच्या शिक्षणाचा मार्ग त्यांस मोकळा झाला ! विठ्ठलरावांच्या मनाला ही गोष्ट फार लागून राहिली. आपला कांहीं अपराध नसतां ह्या संस्थानिकांनीं आपला अनादर केला, म्हणून तेथें न राहण्याचा निश्चय करून त्यांनीं बेळगांवचा रस्ता धरला ! तेथें कांहीं दिवस हालांत काढून त्यांनीं अखेरीस पुणें गांठलें. पुण्यास आल्यावर प. वा. गंगाराम भाऊ म्हस्के ह्यांच्या सहाय्यानें त्यांस डेक्कन मराठा ऍसोसिएशनमधून थोडी मदत मिळूं लागली. ही मदत अर्थात् अपुरी होती. त्यामुळें आपल्या खर्चाच्या भरपाईसाठीं त्यांना शिकवण्या पत्कराव्या लागत आणि आपल्या घरची विपन्नावस्था त्यांच्या दृष्टीपुढें रात्रंदिवस असे. त्यामुळें कसरींत कसर काढून ते जेव्हां साधेल तेव्हां आपल्या घरच्या मंडळीचाही योगक्षेम चालवीत असत ! अशाप्रकारें हालअपेष्टा सहन करीत इंटरमिजिएटपर्यंत त्यांनीं गाडें ढकललें. पण पुढें परीक्षेस बसण्यासाठीं भरावयाची फीही मिळण्याची पंचाईत पुढें येऊन उभी राहिली ! आपल्या मराठेपणावर दोन चार दारीं उन्हातानांतून जाऊन त्यांनीं भिक्षा मागितली, व एका घरीं जातां मराठा म्हणवून घेऊन, हें असलें भिकारडें काम करण्याबद्दल त्यांनीं आपली चांगलीच संभावना करून घेतली !

इंटरमिजिएट परीक्षा पसार झाल्यावर विठ्ठलरावांस जरा बरे दिवस आले. श्री. सरकार सयाजीराव महाराज ह्यांनीं कृपावंत होऊन ह्यांच्या पुढल्या शिक्षणाचा भार आपल्यावर घेतला. त्यामुळें विठ्ठलरावांस आपल्या मातापितरांस शिकवणीचे पैसे घरीं पाठवून थोडें बहुत सहाय्य करतां येऊं लागलें व त्यानंतरच धर्मासंबंधानें विचार मनामध्यें जागृत होऊन ते पुण्याच्या समाजांत जाऊं लागले. प्रथम ते समाजामध्यें केवळ मौजेसाठीं, नंतर शिक्षणासाठीं व त्यानंतर समाजाशीं एकजीव होऊन जाऊं लागले. १८९८ त ते बी. ए. च्या परीक्षेंत उतरले. त्याच वर्षीं ते पुण्याच्या समाजाचे सभासद झाले. व पुढें ते एल. एल. बीचा अभ्यास मुंबईंत राहून करीत होते. रा. शिंदे वकील झाले असते, तर बडोदें संस्थानांत आज एखाद्या हुद्यावर असते. परंतु ईश्वरी नेमानेम कांहीं निराळा होता. प्रार्थना समाजांत ते जात असतांना त्यांच्या विचारांस निराळें वळण लागत होतें. त्यांच्या मनामध्यें अनेक विचार, अनेक योजना, अनेक कल्पना, अनेक शंका, प्रतिशंका येत होत्या. समाजसेवेसंबंधानें फार आस्थेनें त्यांचे विचार चालू होते. देशाची सेवा आपण करावयाची, तर ती कोणत्या बाजूनें करावी, ह्याविषयीं निश्चित विचार होतो न होतो, तों प्रार्थना-समाजांतील एक होतकरू गृहस्थ ऑक्सफर्ड येथें तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावयास जात असतां पोर्टसेड येथें मरण पावला; ह्या गोष्टीचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यांनीं रा. रा. मोती बुलासा ह्यांच्या मागून विलायतेस जाण्याचा निश्चय केला;  एल. एल. बीची परीक्षा बाजूस ठेविली व युनिटेरिअन् स्कॉलरशिप मिळावी म्हणून त्यांनीं अर्जही केला. पुण्याच्या समाजाच्या शिफारशीवरून कलकत्याच्या ब्राह्मसमाजकमिटीनें युनिटेरिअन् ऍसोशिएशनला शिफारस केली व त्यांची निवडणूकही झाली. नंतर त्यांच्या मित्रांनीं त्यांस सहाय्य केलें; वडिलांनीं त्यांस आशीर्वाद दिला; व त्यांच्या समाजबंधूंनीं त्यांचें अभीष्ट चिंतिलें. जाण्यापूर्वी गुरूवर्य डॉ. भांडारकरांनीं पुण्यास विशेष उपासना चालविली व त्यावेळीं अशाच कार्यासाठीं आपले एक तरूण सभासद जात असतां प्राणास मुकले, हें जाणून त्या प्रसंगाची आठवण ताजी असतांच हे दुसरे तरुण पुढें आले, ही ईश्वरी कृपा होय, हा विचार मनांत येऊन त्या दिवशीं गुरूवर्य अगदीं सद्गदित झाले आणि त्यांनीं विठ्ठलरावांस आशीर्वाद दिला. ता. २१ सप्टेंबर १९०१ रोजीं विलायतेस जाण्यासाठीं त्यांनीं आपल्या मातृभूमीची दोन वर्षांपुरती रजा घेतली.

विलायतेंतील कार्य.
विठ्ठलरावांनीं विलायतेस जाऊन जें कांहीं केलें, व आपल्या पुढील कार्याची तयारी त्यांनीं कशी केली, याची अल्पशी कल्पना करून देण्यापूर्वी त्यांनीं जो स्वार्थत्याग दाखविला, त्याच्यासंबंधानें दोन शब्द येथें लिहिणें अगत्याचें आहे.
आजकाल विलायतेस अभ्यासासाठीं जाणारांची संख्या कांहीं कमी नाहीं. विठ्ठलराव विलायतेस गेले, ह्यांत खरोखर कांहीं विशेष नव्हतें. परंतु गायकवाड सरकारांतून चांगली सुखाची नोकरी मिळत असतां तिचा त्याग करून, पुढील सबंध आयुष्यभर धर्मकार्यासाठीं अगदीं गरीबीमध्यें राहण्याचा निर्धार करून धर्मप्रचारक होण्यासाठीं परदेशीं जाणें, ही गोष्ट विशेष आहे. दुसरें असें कीं, ब्राह्मधर्माचा प्रसार करणा-या कित्येक प्रचारकांनीं सबंध आयुष्य अगदीं दारिद्र्यामध्यें घालविल्याचीं उदाहरणें डोळ्यांपुढें असतां, त्यांनीं प्रचारक होण्याचा निर्धार केला व युनिटेरिअन् ऍसोसिएशनच्या स्कॉलरशिपचा स्वीकार केला. त्यावेळींही कित्येकांनीं त्यांच्या संबंधानें नापसंतीचे उद्गार काढलेच ! त्यांच्या एका मित्रानें तर त्यांना सांगितलें कीं, “तूं विलायतेस जात आहेस, पण आजच कित्येक लोक तुजसंबंधानें भविष्य वर्तवूं लागले आहेत. तेव्हां तूं फार दक्षतेनें वागलें पाहिजेस.”

विलायतेस जाण्यासाठीं बोटीवर पाय ठेवल्यापासून ते परत स्वदेशीं येईतों त्यांनीं सुबोधपत्रिकेसाठीं जे लेख लिहिले आहेत त्यांत एक गोष्ट विशेष आहे. ती ही कीं, त्यांची असामान्य निरीक्षणशक्ति, (Power of observation.) या त्यांच्या ईश्वरदत्त देणगीमुळें त्यांच्या वर्णनात्मक लेखांमध्यें जी तडफ दिसते, जी संजीविनी दिसते, जें विलक्षण वर्णनसामर्थ्य आढळून येतें, तें इतरांच्या लेखांत निदान माझ्या तरी अनुभवास आलेलें नाहीं. त्यांनीं ‘जनांतून वनांत’ असा लिहिलेला लेख व वर्डस्वर्थ कवीसंबंधानें केलेलें वर्णन वाचून येथील कित्येक तरुण—अशा प्रकारचे लेख लिहिणारे, नास्तिकांमध्यें आस्तिक्यबुद्धि उदित करणारे, हताश झालेल्यांस जागे करणारे, तरुण गृहस्थ स्वदेशीं केव्हां येतात, याची मार्गप्रतीक्षा करीत होते !  कॉलेजांत अभ्यास करीत असतां विठ्ठलराव स्वस्थ बसले नाहींत. हिंदुस्थानचें दारिद्र्य व त्या दारिद्र्यामुळें दीन झालेले जे लोक त्यांना विलायतेंतील एका बाजूची सुखसोहळ्याची स्थिति पाहून ते भाळून गेले नाहींत ‘वेस्ट एन्ड’ चें वैभव सर्वच पहातात व हयाच्यायोगें पुष्कळांचे डोळे दिपून जातात. परंतु तेथें शिकत असतांना दारिद्र्याचा यथेच्छ अनुभव घेतलेल्या ह्या आमच्या मित्राचें ‘ ईस्ट एण्ड’ च्या बाजूकडील लोकांकडे लक्ष गेलें. लंडनच्या वैभवानें त्यांचे डोळे दिपून न जातां, शहराच्या दुस-या भागांत जें अठरा विस्वे दारिद्र्य मूर्तिमंत वसत आहे, त्यानें नाडलेल्यांच्या साहाय्यासाठीं तेथें कोणकोणते उद्योग होत असतात, याची त्यांनीं माहिती मिळविली; पॅरिस येथें गेले असतांना तेथील लोकांच्या मनोरंजनाच्या कल्पना किती चमत्कारिक झाल्या आहेत, याचा त्यांनीं अनुभव घेतला;  नीतीच्या कल्पना किती शिथिल झाल्या आहेत हें त्यांनीं पाहिलें व धर्माचा पाया असल्यावांचून झालेली इमारत कशी भलतीकडेच झुकत चालाली आहे, याचा त्यांनीं अनुभव घेतला. ही सर्व त्यांच्या पुढील कामाची अप्रत्यक्ष तयारी होती.

ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजांतील शिक्षणक्रल पुरा झाल्यानंतर परत येण्याच्या सुमारास म्हणजे सन १९०३ च्या जुलै  महिन्यांत ऍमस्टरडॅम येथें उदार धर्मवादी मंडळींची एक मोठी परिषद झाली. उदार धर्माची लाट इंग्लंडांत निरनिराळ्या स्वरूपानें पहावयास सांपडते. युनिटेरिअन् मंडळींत दिसून येणारें विचारौदार्य इतर पंथांच्या लोकांतही आढळून येतें. अशा सर्व उदार मतवादी मंडळींच्या परिषदेंत हिंदुस्थानाच्या वतीनें विठ्ठलरावांची नेमणूक झाली होती. त्या परिषदेंत त्यांनीं Liberal Religion in India ह्या विषयावर निबंध वाचला होता; त्यावरून तेथें जमलेल्या लोकांना हिंदुस्थानामध्यें उदार धर्माच्या चळवळींचें स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे, त्याची चांगली कल्पना झाली. अशा प्रकारें आपल्या स्वतःचा फायदा करून घेऊन, निरनिराळ्या प्रकारचा अनुभव अनुभवून, धर्मप्रचारकाच्या कामासाठीं आपल्याला वाहून घेण्याच्या निश्चयानें, विठ्ठलराव ६ आक्टोबर १९०३ रोजीं स्वदेशीं परत आले.                          
येथील कामगिरी.
धर्मप्रचाराचें कार्य करण्याचा विठ्ठलरावांचा निश्चय आणि येथील प्रार्थनासमाजालाही आपल्या समाजाला एक धर्मप्रचारक असावा असें कित्येक दिवसांपासून वाटत होतें. अर्थात् शिंदे परत आल्यानंतर त्यांची धर्मप्रचारकाच्या जागीं योजना करण्यांत आली. ह्या कामास प्रारंभ केल्याबरोबर त्यांनीं हिंदुस्थानांत बराच प्रवास केला. ठिकठिकाणची स्थिति कोणत्या प्रकारची आहे, त्याचें अवलोकन केलें, व नंतर ते आपल्या कामास लागले. प्रार्थनासमाजाचे प्रचारक असतांना त्यांनीं जें कार्य केलें त्याचे दोन विभाग करितां येतील. एक धार्मिक व एक सामाजिक—धार्मिक. माझी स्वतःची समजूत अशी आहे कीं, आज रा. शिंदे हे जरी कित्येक कारणांमुळें प्रार्थनासमाजाचे प्रचारक नाहींत, तरी ते जें काम आज करीत आहेत, तें दिसावयास जरी सामाजिक ठरतें, तरी त्याचें वास्तविक स्वरूप सामाजिक—धार्मिक आहे. तें कसें त्याचा उल्लेख आतां पुढें होईलच.

धर्मप्रचारक असतांना मुंबईच्या प्रार्थनामंदिरांत त्यांस वारंवार धर्मपर व्याख्यानें द्यावीं लागत. त्यांपैकीं अलीकडील कांहींकांचा ह्या संग्रहामध्यें समावेश झाला आहे. त्यांत विशेष काय आहे त्याचें वर्णन येथें करण्याची आवश्यकता नाहीं. वाचकांनीं तीं मननपूर्वक वाचावीं म्हणजे त्यांतील विशेष प्रत्यक्ष अनुभवता येईल. प्रार्थनासमाजाचें सर्व कार्य आतां तरुण पिढीवर येऊन पडत आहे, त्यांच्यामध्यें अधिक जागृति व्हावी म्हणून त्यांनीं ‘Young Theists Union’  नामक संस्था स्थापिली. तरुणांस एकत्र करण्यास, त्यांच्या विचाराविषयीं सढळ चर्चा करावयास, उपासना करण्याची संवय लावावयास व उपदेश करण्याची तयारी करण्यास, त्याचप्रमाणें पवित्र, उदार धर्माचा एक प्रवर्तक ह्या नात्यानें आपल्यावर किती जबाबदारी आहे, त्याची जाणीव उत्पन्न करण्यास ही संस्था एक उत्तम साधन आहे. कित्येक वर्षे रा. शिंदे हेच त्या संस्थेचे प्रमुख होते.

टपालाच्याद्वारें धर्मप्रसाराचें कार्य.
विलायतेंत असतांना विठ्ठलरावांच्या हें लक्षांत आलें कीं, टपालखातें हें धर्मप्रसाराचें कार्य करण्याचें उत्तम साधन आपल्या देशींही होण्यासारखें आहे. तेथें हें काम स्त्रिया करितात. लहान मोठीं पुस्तकें एकत्र करून तीं जिज्ञासूंना वाचावयास द्यावयाचीं, त्यांच्या ज्या कांहीं अडचणी असतील त्या आपण सोडविण्याचा प्रयत्न करावयाचा, नाहींतर कोणा अधिकारी पुरुषाची गांठ घालून द्यावयाची, वर्तमानपत्रांमध्यें जाहिराती देववून आपलीं पुस्तकें लोकांच्या दृष्टीपुढें आणण्याचा निश्चयानें प्रयत्न करावयाचा. हा अत्यंत लाभदायक उद्योग टपालाच्या साहाय्यानें तेथें स्त्रिया करितात, हें पाहून विलायतेंत असतांना येथील भगिनींना अनावृत पत्र लिहून त्यांनीं हें काम आपल्यांकडे घ्यावें असें सुचविलें; पण, स्त्रियांपैकीं कोणी पुढें न आल्यामुळें रा. वासुदेवराव सुखटणकर यांनीं त्या कामास येथें मोठ्या उत्साहानें आरंभ केला. विलायतेंत पोष्टाच्याद्वारें शेंकडों लोकांना उदारधर्माची ओळख होते त्याप्रमाणें येथेंही होऊं लागली. रा. सुखटणकरांचा किती तरी वेळ शंकितांचें समाधान करण्यांत जाऊं लागला व त्यामुळें शेंकडो लोकांना उदारधर्माच्या चळवळीची व प्रार्थनासमाजासारख्या संस्थेची माहिती झाली. रा. सुखटणकर विलायतेस गेल्यावर विठ्ठलरावांनीं तें काम आपल्याकडे घेतलें. मिशनच्याद्वारें कांहीं लहान लहान पुस्तकें प्रसिद्ध केलीं व अल्प किंमतीस चांगलीं चांगलीं पुस्तकें विकून त्यांनीं उत्तम पुस्तकांचा प्रसार केला.

तरुण पिढीकडे त्यांचें साहजिक लक्ष असल्यामुळें, त्यांनी कांहीं काल तरुणास एकत्र करून कांहीं धर्मपर ग्रंथ वाचले व त्यांचें अवश्य तेथें स्पष्टीकरण केलें. परंतु हें कार्य फार दिवस टिकलें नाहीं.

धर्मपरिषद.
१८८८ सालीं राष्ट्रीय सभेच्या वेळीं अलाहाबाद येथें एकेश्वरी मताची बरीचशी मंडळी जमली असल्याचें आढळून आलें व त्याच वेळीं रा. ब. महादेव गोविंद रानडे ह्यांच्या आश्रयाखालीं एक परिषद् भरविण्यांत आली; व पुढें दर वर्षी अशीच परिषद् भरावी असें ठरलें. व त्याप्रमाणें अशी परिषद् भरत असे. परंतु मधून मधून तिचे संबंधानें थोडी शिथिलताही येत असे. प्रथमतः आर्यसमाजाची मंडळीही परिषदेंत सामील होत असे, परंतु नंतर ही परिषद् ब्राह्म व प्रार्थनासमाज—मतानुयायांची व त्यांचे हितचिंतक यांचीच झाली. १९०४ सालीं राष्ट्रीय सभेच्या वेळीं परिषदेची बैठक मुंबईस झाली व ती ब-याच मोठ्या प्रमाणावर झाली. तिचें बरेंचसें श्रेय रा. विठ्ठलराव यांस दिलें पाहिजे. ह्या प्रसंगीं प्रीतिभोजन झालें व त्या वेळीं गायकवाड सरकार श्री. सयाजीराव महाराज हजर होते. १९०४ सालापासून त्या धर्मपरिषदेस विशेष स्वरूप प्राप्त झालें. पुढें कित्येक वर्षेपर्यंत विठ्ठलराव ह्या परिषदेचे सेक्रेटरी असत व ज्या प्रांतांत परिषद् भरे, त्या प्रांतांतील एक गृहस्थ त्यांच्या जोडीला काम करावयास असे.

थीइस्टिक डिरेक्टरी.
हिंदुस्थानांत सर्व प्रांतीं प्रार्थना व ब्राह्म समाजाची स्थापना झालेली आहे, व सर्वत्र ब्राह्मधर्माचे अनुयायी आहेत. परंतु हे जे निरनिराळे समाज सर्वत्र पसरले आहेत, त्यांच्यासंबंधानें माहिती देणारा एक लहानमोठा ग्रंथ नाहीं.  ही उणीव लक्षांत घेऊन १९०५ सालीं बनारस येथें भरलेल्या परिषदेंत अशा प्रकारची डिरेक्टरी तयार करण्याचें काम रा. विठ्ठलराव यांचेवर सोंपविण्यांत आलें. ह्या कामास त्यांनीं जरी लागलाच प्रारंभ केला, तरी अनेक अडचणींमुळें हें पुस्तक आजवर बाहेर निघालें नाहीं. परंतु आतां थोड्याच दिवसांत तें प्रसिद्ध होईल. ह्यांतल्या पहिल्या भागांत ब्राह्म व प्रार्थना-समाजांशिवाय जगांतील निरनिराळ्या देशांत चालू असलेल्या उदार धर्मचळवळींसंबंधीं कांहीं लेख असून न्या. मू. सर नारायणराव चंदावरकर ह्यांनीं प्रस्तावना लिहिली आहे. दुस-या भागांत देशांतील सर्व समाजांसंबंधानें रा. विठ्ठलरावांनीं गोळा केलेली तपशीलवार माहिती संग्रहित करण्यांत आली आहे.                     
सामाजिक-धार्मिक कामगिरी.
लंडनहून परत आल्यावर श्री. गायकवाड सरकारांनीं आपल्या प्रांतांत अंत्यजांसाठीं स्थापलेल्या कांहीं शाळा पाहण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावरून विठ्ठलरावांनीं बडोद्यांतील चार शाळा तपासून आपलें मत महाराजांना कळविलें. नंतर अहमदनगर येथें पूर्वींपासून स्वोन्नतीसाठीं सोमवंशीयसमाज नांवाची संस्था जे प्रयत्न करीत होती, तिकडे यांचें लक्ष लागलें. पूर्वींपासून ह्या लोकांच्या अत्यंत हीन स्थितीसंबंधानें यांच्या ठिकाणीं उद्वेग उत्पन्न झालेला होताच. सहानुभूतीचें बाळकडू त्यांस त्यांच्या माता-पितरांनींच पाजिलें होतें. साधुसंत, फकीर यांस त्यांच्या घरांत मुक्तद्वार असे. अशा ह्या दीन लोकांसंबंधानें कांहीं तरी जागृति समाजांत राहण्यासाठीं येथील सोशल रिफार्म ऍसोसिएशनपुढें त्यांनीं १९०५ सालीं एक व्याख्यान दिलें. त्या व्याख्यानांत अत्यंजांसंबंधानें सविस्तर माहिती त्यांनीं दिली होती;  व तेंच व्याख्यान इंडियन सोशल रिफॉर्मरमध्यें प्रसिद्ध करण्यापूर्वी कित्येक दिवस खानेसुमारीचे सरकारी रिपोर्ट व इतर रिपोर्ट यांचें परिशीलन करून अवश्य ती माहिती ते गोळा करीत होते. अखेरीस नीच मानिलेल्या लोकांच्या उन्नतीसाठीं उच्च वर्गांतील लोकांत विशेष जागृति झाल्यावांचून त्यांचेसंबंधानें होत असलेल्या अन्यायाची व्याप्ति किती मोठी आहे, हें लोकांच्या लक्षांत यावयाचें नाहीं, असें मनांत येऊन त्यांनीं ह्या चळवळीस हश्य स्वरूप आणण्याचा निश्चय केला व प्रार्थना-समाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास ह्यांनीं १ हजार रुपयांची देणगी दिल्यानंतर रा. शिंदे यांनीं परळ येथें ना. सर नारायणराव चंदावरकर यांच्या हस्तें १८ आक्टोबर १९०६ रोजीं लहान प्रमाणावर अस्पृश्य वर्गासाठीं एक शाळा उघडली, व लवकरच न्या. मू. सर नारायणराव चंदावरकर ह्यांनीं अध्यक्षस्थान व शेठ दामोदरदास यांनीं उपाध्यक्षस्थान पत्करल्यावर, Mission to the Depressed Classes in India  ही संस्था त्यांनीं स्थापन केली. अस्पृश्य-वर्गांच्या उन्नतीसंबंधाच्या चळवळीस रा. शिंदे ह्यांनीं प्रारंभ केला असें म्हणणें सर्वथैव अन्यथा होणार नाहीं. हा प्रश्न सार्वजनिक रीतीनें पुढें आणण्याचा मान जरी सामाजिक परिषदेस आहे, व प. वा. न्या. मू. रानडे यांचें ह्या विषयाकडे फार लक्ष असे हें जरी सर्वश्रुत आहे, तरी आज सगळ्या मुंबई इलाख्यांत व बाहेरही जी चळवळ सुरू झाली आहे व खुद्द अस्पृश्य वर्गामध्यें जी जागृति उत्पन्न झाली आहे, तीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीनें रा. शिंदे कारण झाले आहेत, असें म्हणणें हें वस्तुस्थितीस अगदीं धरून आहे, ‘बहिष्कृत भारत’ ह्या मराठी पुस्तकानें, Untouchable India  ह्या इंग्रजी पुस्तकानें, व त्यांच्या नित्याच्या सफरी, हितचिंतकांशीं होणारीं संभाषणें, निरनिराळ्या ठिकाणचीं व्याख्यानें, वर्तमानपत्रांतील लेख, ह्यांनीं किती काम केलें आहे त्याची साक्ष मंडळीचें वाढतें काम, वाढता व्याप, वाढता खर्च व वाढती जबाबदारी, ह्यावरूनच होण्यासारखी आहे. त्यांच्या कामाचा विस्तार किती व कसकसा वाढला आहे, हें आक्टोबर महिन्यांत पुण्यास जी परिषद् भरली होती त्यावेळीं रा. शिंदे यांनीं जें प्रास्ताविक भाषण केलें, त्यांत त्यांनीं फार उत्तम रीतीनें सांगितलें आहे.

उपसंहार.
अशा प्रकारचें काम एक स्वतः मागासलेल्या जातींतील गरीब तरुण करूं शकतो, याचें रहस्य कशांत आहे, याचा विचार आमच्या राष्ट्रांतील तरुणांनीं अवश्य करण्यासारखा आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या कामावरून असें दिसतें कीं, त्यांचा धाडसी स्वभाव, त्यांची कल्पकता व त्यांचें कर्तृत्त्व हे गुण फार वरच्या दर्जाचे आहेत. अनेक कारणांमुळें प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक असें जरी त्यांस आज म्हणवून घेतां येत नाहीं, तरी हीन मानिलेले लोक हे आपले बंधु आहेत, ही भावना अंतःकरणांत दृढ करून घेऊन, ते जें काम करीत आहेत, त्याचा पाया धर्म हाच आहे. त्यांच्या शाळांतून धर्मशिक्षण देण्यांत येतें. भजन होतें, उपासना होतात व सद्धर्माची गोडी लावण्यासाठीं अनेक प्रकारें प्रयत्न होत असतात. त्यांच्या कर्तृत्वशक्तींत असा गुण आहे कीं, त्यांची कल्पकता व त्यांचें योजनाचातुर्य ह्यांमुळें त्यांची छाप कर्त्या माणसांवर सहज पडते ! त्यांचीं मातापितरें जुन्या वळणांतलीं, साधुसंत व फकीर यांच्याकडील त्यांचा ओढा जुन्या रीतीचा होता, तरी तींच आपल्या चिरंजिवाचे पहिले सहाय्यक बनले, त्यांच्या दोघी बहिणींनीं व पत्नीनेंही ह्याच कार्यासाठीं आपल्याला वाहून घेतलें. त्यांचें तीर्थरूप अखेरपर्यंत त्यांस सहाय्य करीत होते व ह्या कामांत गढून गेलेले असतांनाच १९१० सालीं प्रिय पत्नीचा वियोग झाल्यानंतर कांहीं महिन्यांनीं त्यांचें देहावसान झालें. आतां गेल्या आक्टोबर महिन्यांत पुढील कार्यक्षेत्र बरेंच वाढविल्याचें जाहीर करण्यांत आलें. आतां त्यांनीं ह्या आपल्या कार्यास शेठ रतन टाटा, ना. फाजलभाई करिमभाई, शेठ नरोत्तम मुरारजी, ना. सर चिनूभाई माधवलाल, एस.एन.पंडित, एच.ए. वाडीया वगैरे निरनिराळ्या जातींच्या प्रमुख गृहस्थांच्या सहानुभूतीची भर पांडली आहे; व परवां होळकर सरकारांनीं कृपावंत होऊन संस्थेस २० हजारांची देणगी परलोकवासी महाराणी पु. श्लो. अहल्याबाई होळकरांच्या नांवानें देण्याचें अभिवचन दिलें आहे. सालिना २६ हजार रुपयांचा खर्च सोसून १५ शाखा आतां ही मंडळी चालवीत आहे.

शेवटीं आज हे माझे मित्र जें काम करीत आहेत, त्याचें बरेंचसें श्रेय श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांस देणें रास्त आहे. म्हणून मी त्यांचे कृतज्ञबुद्धीनें अत्यंत नम्रतापूर्वक आभार मानतों. एका अगदीं गरिबींत असलेल्या तरुणास विद्यार्थीवेतन देऊन त्यांनीं शिकविलें, पुढें त्यानें परीक्षा पास झाल्यावर आपल्या संस्थानांत नोकरी करावी असें ठरलेलें असतांना, त्यास प्रार्थनासमाजाचा प्रचारक होतां यावें म्हणून ती अट महाराजांनीं काढून घेतलीः  विलायतेस जातांना मदत केली व येतांना भाड्याची व्यवस्था केली ! पुढें आपल्या संस्थानांतील शाळा पहावयास महाराजांनींच आमंत्रण दिलें ! तेंव्हां आज आपल्या देशाला हें व अशीं दुसरीं कामें करण्यासाठीं जरी आणखी पुष्कळसे शिंदे हवे आहेत, तरी महाराजसाहेबांच्या कृपेमुळें हे जे तरुण कर्तृत्ववान् व योजक प्रचारक आज लाभले आहेत, त्यांस परमेश्वरानें दीर्घायु करावें, त्यांस पुष्कळ सहाय्यक मिळावेत, व अस्पृश्य लोकांस हीनावस्थेप्रत पोहोंचविल्याचा उच्च लोकांना लागलेला डाग, त्यांच्या हातून साफ धुऊन जावा, व त्यांची कर्तृत्वशक्ति दिवसेंदिवस वाढतच जावी, अशी परमेश्वरापाशीं प्रार्थना करून हा चरित्रात्मक त्रोटक लेख येथेंच संपवितों.

मुंबई, ता. २० डिसेंबर १९१२.

वर्डस्वर्थ भेट आणि डव्ह कॉटेजची यात्रा

मूर्तिपूजक आणि सौंदर्योपासक असे जे प्रकृतीचे भक्त आहेत, त्यांचे हा सरोवर प्रांत म्हणजे एक मोठे क्षेत्रच आहे. ह्या क्षेत्रातील उपाध्यायाची कायमची नेमणूक वुइल्यस वर्डस्वर्थ ह्यजकडे आहे. ह्या कवीचा लौकिक-जीवनकाळ जरी १७७०-१८५० ह्या अवधीतच आटपला तरी ह्या क्षेत्रात उपाध्येपणाचा धंदा तो अद्यापि चालवीत आहे असे म्हणण्यास फारशी हरकत येणार नाही. ह्या प्रांती पदोपदी कोणातरी मोठ्या पुरूषाचे स्मारक पाहाण्यात येते अगर पुण्यकथा ऐकण्यात येतेच. झाडी, माळ, रस्ते, वाटा एकंदरीत सर्व वातावरणच ह्या पवित्र आत्म्यांनी गजबजून गेले आहे. ह्यामुळे येथे येणा-या परकीयांची, विशेषत: मजसारख्या पौरस्त्याची मोठी चमत्कारिक स्थिती होऊन जाते. मूळ देश पहावा तर तळहाताएवढा. भूगलातच नव्हे तर इतिहासातही, आकृती लहान पण हल्ली पराक्रम भूमंडळी मावेनासा झाला आहे. पराक्रम खोटा आहे, असे कोणीही समंजस मनुष्य म्हणत नाही. गुणांचा मक्ता काही ह्याच राष्ट्राला दिलेला नाही. ते सर्वात कमीजास्त आहेत. पण गुणांचे चीज, किंबहुना बोभाट देखील करण्याची इकडच्या लोकांना जी हातोटी साधली आहे ती पाहून निदान पौरस्त्याला तर फार फार कौतुक वाटल्यावाचून रहात नाही. मोठा पुरूष जन्मला की पुरे, तो सर्व राष्ट्राचे धन होऊन बसतो. त्याच्या पश्चात त्याचे स्मारक काय करू, कसे करू, असे सर्व राष्ट्राला होऊन जाते. मोठमोठ्या शहरांत जेथे माणसांची गर्दी फार तेथे स्मारकांचीही गर्दी जमलेली असते, हे सांगावयाला नकोच, पण अशा निर्जन व निवांत स्थळीदेखील कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने स्मारकेही पुढे येतातच. हे पाहून ह्या राष्ट्राची मोठी धन्यता वाटते. ह्यावरून पाहता वर्डस्वर्थला येथे जो आदर मिळत आहे तो त्याच्या थोरवीला मुळीच जास्त नाही. जास्त असो, कमी असो, जो मिळतो तो असा बिनबोभाट मिळत आहे की, एकांतप्रियता हा त्याचा मोठा गुण त्याच्या स्मारकात विशेषच खुलून दिसत आहे.

वर्डस्वर्थची कविता म्हणजे सायंकाळच्या चिंतनासारखी शुद्ध आणि उदात्त, गंभीर आणि प्रसन्न आहे. तिचे सेवन केल्याने मनाला क्षोभ होत नाही की माज येत नाही, किळस वाट नाही किंवा आळस वाटत नाही. ह्याची कृती म्हणजे खासगी अनुभवाची लहान लहान पद्ये, जणू रामबाण मात्रेच्या गोळ्याच! इतरांचे सूर नुसते कानांतच राहतात. पण ह्याच्या सुरांचे ठसे अंतरातल्या फोनोग्राफवर तात्काळ उठून पुन: कधी तसा बाह्य प्रसंग आल्यास ते आपोआप आत वाजू लागतात! फ्रेंच ग्रंथकार व्हॉल्टेअर म्हणतो की, ‘काव्यमध्ये नीतीचा उद्गार इंग्रजी कवींनी जितक्या जोराने केला आहे त्याहून जास्त इतर कोणीही केला नाही.’ आणि वर्डस्वर्थने अस्सल नीतीची जी कामगिरी बजावली आहे, तशी इतर कोणत्याही इंग्रज कवीने बजावलेली नाही. नीतीच नव्हे तर त्याच्या काव्यात धर्माचीही जिवंत आणि जागती ज्योत जळत आहे. त्याचे पद्य म्हणजे परमात्म्याचे परंपरया स्तोत्रच. परंपरया म्हटले म्हणून त्याची प्रत्यक्षता कमी असे मुळीच नव्हे, उलट अनेक रूढ धर्मात देवाच्या ज्या सहस्त्र नामावळीचा घोष चालू आहे, त्यावरूनही परमेश्वराचा संबंध इतक्या प्रत्यक्षपण जडण्याचा मुळी संभव नाही. वर्डस्वर्थची नीती आणि धर्म ही दोन्ही नवीन जन्मलेल्या बालकाच्या उल्हासासारखी ताजी आणि नेणती आहेत, आणि तितकीच तंतोतंत निकट प्रत्यक्ष आहेत! ह्याचे कारण हेच की, मुलाप्रमाणे वर्डस्वर्थनेही आपला सृष्टीशी अगदी अव्यभिचरित आणि अखंडित संबंध राखला होता. तो म्हणतो:

The World is too much with us,-late and soon;
Getting and spending,-we lay waste our powers;
Little we see in Nature that is ours;
We have given our hearts away,-a sordid boon.

ज्या फुलाजवळून आम्ही सहज न पाहता जाऊ त्यातच भ्रमर येऊन तासानुतास अडकून पडतो तीच स्थिती वर्डस्वर्थची होत होती हे त्याच्या खालील चरणावरून दिसते.

To me the meanest flower that blows
Can give thoughts that do often lie deep for tears.

असा हा सृष्टीचा भक्त आणि भोक्ता ईश्वराचे गुण डोळ्याने पाहून, तोंडाने गात मरेतोपर्यंत ह्याच प्रदेशात राहून गेला. बॉरोडेलहून सुमारे २५ मैलांवर डोंगराच्या कुशीत ग्रासमिअर नावाच्या सुंदर सरोवराच्या काठी ग्रासमिअर खेड्यात डव्हकॉटेज नावाच्या कुटिकेत वर्डस्वर्थ राहत असे ती पाहण्यास आम्ही एके दिवशी गेलो.

स्ट्रॅटफर्ड-ऑन-एव्हन ह्या गावी शेक्सपियरच्या स्मारकाचा जो भपका, थाटमाट आणि गोंगाट दिसला तशातला येथे मुळीच प्रकार नव्हता. एक झोपडी केवळ साधेपणाची आणि शांतीची मूर्तीच! दगडमातीचे हे माणसांनी बांधलेले घरकुल, पण भोवतालची सर्व भोवतालची सर्व सृष्टी त्याकडे कशी आदरपूर्वक पहात बसली होती. झोपडीच्या भिंती मजबूत पण ठेंगण्या होत्या. त्यांना आत बाहेर चुन्याची सफेती फासली होती. (हल्ली ह्या देशात अशा सफेत भिंतीत क्वचित एकाद्या जुन्या खेड्यात आढळतात). खपरेल अगदी खालपर्यंत येऊन नम्रता दाखवीत होते. इंग्लिश घराचे मुख्य लक्षण जे धुराडे ते तर फारच जुन्या चालीचे, त्यावर शेकडो हिवाळ्यांच्या खुणा दिसत होत्या. घराभोवती पुराणपद्धतीचे पण हल्ली दुरूस्त राखलेले वळणदार कंपौंड होते. त्यातून आत जाण्यास १८ व्या शतकातले फाटक होते. आम्ही प्रत्येक ६ आण्याचे तिकीट घेऊन आत गेलो.

आत गेल्यावर १०० वर्षांमागची इंग्रजी साधी रहाटी आणि उच्च विचार ह्यांचे दाखले खाली फरशीवर, बाजूस भिंतीवर, वरती पाटणीवर भरपूर दिसू लागले. कवी १८०२ मध्ये एकदा लंडनला गेला असता त्याचे असे उद्गार निघाले होते:-

...       ...     ...     ....    I am opprest
To think that now our life is only drest
For show mean handy work of craftman, cook
Org groom-we must run glitting like a brook
In the open sunshine or we are unblest,

Rapine avarice, expense,

१८०२ साली जर बिचा-याला ही स्थिती दिसली तर १९०२ साली परवा झालेला राज्याभिषेक समारंभ पाहून त्याला काय वाटले असते! ते काही असो. पण हा समारंभ आणि ही झोपडी दोन्ही एकाच देशात, एकाच काळी कशी असू शकतात, ह्याचे मला मोठे कोडे पडले. ही झोपडी पाहण्यास वर्डस्वर्थचे भक्त म्हणविणा-या हजारो खुशालचंदांची जी येथे गर्दी येते त्यांच्यात वर्डस्वर्थचा साधेपणा दशांशानेही नसतो, तरी ते ह्या झोपडीचे कौतुकच करीत असतात! तिचे फोटो घेतात, तिच्या प्रतिकृती बनवितात! कवीला लंडनातली मूर्तिपूजा सोसली नाही. मला तर ग्रासमिअरमधील मूर्तिपूजा अधिक दु:सह झाली! असो.

या खोपटीत कवी आणि त्याची जिवलग आणि चहाती बहीण डोरोथी अशी दोघेच रहात असत. तळमजल्यात काळ्या दगडाची फरशी होती; ती अगदी झिजली होती. ती पहात पहात आम्ही जेव्हा भिंतीतील मोठ्या व ओबडधोबड चुलीजवळ आलो, तेव्हा कवीच्या एकंदर रहाटीचे चित्र पुढे दिसू लागले. चुलीजवळ रिकाम्या चकाट्या पिटण्यात कधी आनंद होत नसे. तो म्हणतो:
Better than such discourse, doth silence long,
Long, barren silence, square with my desire,
To sit without emotion hope or aim,
In the loved presence of my cottage fire,
And listen to the flapping of the flame,
Or kettle wispering its faint under song.

वरच्या मजल्यात बसावयाच्या खोलीत कवीच्या काही वस्तू, चित्रे वगैरे दोन जड खुर्च्या आणि इतर काही सामान ठेविले आहे. निजावयाचे खोलीत त्याचे अंथरूण तसेच राखून ठेविले आहे. दुस-या एका खोलीत त्याच्या पुस्तकाच्या सर्व आवृत्ती व हस्तलिखिते तावदानात व्यवस्थेने मांडून ठेविली आहेत. काही महत्त्वाची हस्तलिखिते भिंतीवर काचेतून टांगली आहेत. त्याने जी सृष्टीतील निरनिराळ्या देखाव्यांवर गाणी (Sonnets) रचली आहेत, त्यांचे विषय हुबेहूब दाखविण्याकरिता काही वास्तविक व काही काल्पनिक फोटोग्राफ एका चौकटीत एकीकडे टांगले आहेत.

ही झोपडी डोंगराच्या अगदी पायथ्याशी चिकटलेली असल्यामुळे दुस-या मजल्यातून मागच्या बाजूने बाहेर पडले की आपण परसात येतो. हे परसू म्हणजे डोंगराची सरळ उतरणच आहे. बागेत सृष्टीवर कोठेही बलात्कार केल्याचे चिन्ह दिसत नाही, पण तिच्या संमतीने जी साफसफाई आणि वेणीफणी करावयाची तितकीच केली आहे. बागेतील आसने म्हणजे खडकातल्या पाय-या, झाडांच्या वाकलेल्या फांद्या वगैरे. आगंतुक जड एकच बाक जे ठेविले आहे त्याचीही भोवतालच्या परिस्थितीशी पूर्ण संगती आहे! हल्ली येथे कोणी राहत नाही, फक्त दाखविण्यासाठी एक दोन बाया मात्र असतात.

नंतर आम्ही ग्रासमिअर खेड्यातील देवळाच्या स्मशानभूमीतील कवींचे कबरस्थान पाहिले, ते तळ्याच्या अगदी काठालाच आहे. त्याचे आणि त्याच्या प्रिय बहिणीचे थडगे एकमेकाला चिकटून आहेत. दोन लांब चौकोनी भुईसपाट निराळ्या फरशा आणि त्याभोवती दाट हिरवे गवत ह्याशिवाय तेथे काही नाही. देवळाची इमारत किंचित मोठी जुन्या ओबडधोबड नॉर्मन घाटाची आणि भक्कम बांधणीची आहे. देवळात एका खांबावर कवीचा संगमरवरी मुखवटा ठेविला असून खाली या अर्थाचा लेख आहे:-
To the memory of W. Wordsworth…who,
By the special gift and calling of God, was raised
Up to be the chief minister not only of the noblest
Poetry but of high and sacred truth….

असो, ह्या प्रकारे आमचे ह्या प्रांतात १५  दिवस अगदी नकळत गेले. ह्यांपैकी बहुतके दिवस, सकाळी ८ वाजता न्याहारी करून संध्याकाळी ८ वाजता जेवणाचे वेळेपर्यंत खांद्यावर फराळाच्या पडशा टाकून जंगलातून हिंडत, पाण्यावरून तरंगत, पर्वतावरून सरपटत काळ घालविला म्हणावयाचा. ऑक्सफर्डचे प्रोफेसर व विद्यार्थी म्हणजे केवळ पुस्तकातील किडे नव्हेत. लीथस् कॉटेजमध्ये निघणा-या आमच्या एका गमतीच्या पाक्षिक पत्रिकेत प्रोफेसर कार्पेंटर साहेबाबद्दलचा जो उल्लेख आहे तो अगदी खरा आहे आणि मासलेवाईक आहे.

Each day he does a mountain climb,
A ten mile row, theree meals, a witticism
And fills the intervening time with
Pali texts and hebrew criticism.

खरोखरच आम्हा सर्वात प्रोफेसरच अधिक बळकट व काटक ठरले. किती चालले तरी तोंडावर थकल्याचे चिन्ह नसे. वाट शोधून काढणे, लहानसान माहिती देणे, श्रमाची सर्व कामे स्वतः हौसेने व काळजीने करणे वगैरेंची कशी अगदी त्यांना सवयच जडलेली. कोणी थकून मागे राहिल्यास पुन्हा त्याचेसाठी मागे जात. कोणी फार पुढे गेल्यास वाट चुकतील म्हणून पुढेही जात, घरीही निरनिराळे खेळ खेळून व नाना सुभाषिते सांगून सर्वांस उल्हासात ठेवीत.

अशा भल्या गुरूची, गुरूपत्नीची व आनंदी सहाध्यायाची शेवटी रजा घेऊन मी एका स्कॉच सरोवराची वाट धरली.

लंडन शहर.

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड,
ता. १०।१।१९०२.

आमच्या कॉलेजास नाताळची रजा मिळाल्याबरोबर ती लंडन येथें घालवावी म्हणून तिकडे निघालों.  ज्या पाश्चात्य सधारणेचे गोडवे आपण शाळांतून, कॉलेजांतून, ग्रंथातून, गुरुमुखांतून ऐकतों-इतकेंच नव्हे, तर जें हें सुधारणाचक्र, खाऊन पिऊन घरीं स्वस्थ राम राम म्हणत बसणार्‍या आमच्या साध्या भोळ्या राष्ट्रास आज सुमारें १०० वर्षें सारखें चाळवीत आहे त्याचीं कांहीं कळसत्रें वरील अचाट शहरांत दिसतील तीं पहावीं असा एक हेतु निघतेवेळीं मनांत दडून राहिला होता.  कारण, ऑक्सफर्डचें विद्यापीठ हें एक थोरलें आश्रम असल्यासारखें आहे.  येथें विद्याव्यासंगाशिवाय दुसर्‍या कसल्याही भानगडीचें वारें नाहीं.  आणि आधुनिक सधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगांत दुसरीकडे कोठें नाहीं.  तेव्हां निघतांना माझ्या मनांत वरील हेतु असणें साहजिक आहे.  पण लंडन येथें गेल्यावर निराळाच प्रकार झाला !  सुधारलेल्या उद्योगी लोकांचें ५६ लाख वस्तींचें हें मुख्य शहर.  ह्यांत प्रथम गेल्याबरोबर मानवी महासागरांत आपण जणूं गटंगळ्या खातों आहों कीं काय असें वाटूं लागते !  आमच्याकडील पारमार्थिक कवींनीं भवसागराविषयींची आपली भीति वारंवार प्रदर्शित केली आहे. त्यांपैकीं एखादा जर ह्या साक्षात् भवसागरांत येऊन पडला, तर बिचार्‍याची कोण त्रेधा उडून जाईल !  कुठल्याही रहदारीच्या रस्त्यांत गेल्याबरोबर स्त्री-पुरुषांच्या लाटांवर लाटा थडकत असतांना पाहून जगावर मनुष्यप्राणी फार सवंग झाला आहे,  असें वाटतें आणि त्याविषयीं फारशी पूज्यबुद्धि राहत नाहीं.  शेंकडों मंडळ्या, हजारों संस्था, अनेक भानगडी व असंख्य चळवळी, सार्वजनिक हिताकरितां चाललेल्या आहेत हें गाईडबुकांवरून कळतें.  पण त्या कोणत्या कोपर्‍यांत आहेत व त्यांचें ह्या जनसमूहावर काय कार्य घडतें, ह्याचा कांहीं बोध होत नाहीं.  अशा स्थितींत माझ्या वरील हेतूची काय वाट झाली असावी, हें निराळें सांगावयास नको.  शिवाय स्पेन्सरनें आपल्या 'समाजशास्त्राचें अध्ययन' ह्या ग्रंथांत लिहिलेलें आठवतें कीं कोणी एक फ्रेंच प्रवासी इंग्लंडांत येऊन आठ दिवस राहिल्यावर त्यास इंग्रजांविषयीं एक ग्रंथ लिहावा असें वाटून तो लिहूं लागला.  एका महिन्यानें त्याच्या मतांविषयीं त्यालाच खात्री वाटेना.  एक वर्षभर राहिल्यावर तर ग्रंथ लिहिण्याचें काम त्यानें अजीबात टाकून दिलें !  तात्पर्य विश्रांतीकरितां मिळालेल्या सुट्टींत नुसते तर्क लढविण्याची दगदग न करितां ह्या अक्राळविक्राळ शहरांत नजरेस पडतील ते चमत्कार मुकाट्यानें पाहण्याचा मीं निश्चय केला !

कार्थेज, केरो, बगदाद, रोम इ. जगाच्या इतिहासावर परिणाम घडविणारीं जीं प्रचंड शहरें झालीं, त्याच तोडीचें पण त्या सर्वांहूनही मोठें लंडन हें होय.  आणि ह्याचा प्रताप हल्लीं कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारें सर्व जगाला भोंवत आहे.  लोकसंख्येच्या मानानें हें आस्ट्रेलिया खंडापेक्षां सव्वा पटीनें मोठें आहे.  स्काटलंड व वेल्स ह्या दोहोंची लोकवस्ती मिळविली तरी इतकी होत नाहीं.  २० वर्षांपूर्वी ह्याच्या भोंवती जीं खेडीं होतीं तीं आतां ह्यांतील रस्ते झाले आहेत.  तरी अद्यापि हें वणव्याप्रमाणें आसमंतात् झपाट्यानें पसरत आहे.  ह्या शहरांत वाहनांची जी अचाट योजना केली आहे, तिजकडे परकीयांचें लक्ष आधीं जातें.  कांहीं आगगाड्या जमिनीवरून धांवतात, कांहीं उंच कमानीवरून हवेंतून धांवतात, तर कांहीं जमीनीखालून खोल बोगद्यांतून धांवतात.  टैम्स नदीवरून आगबोटी तरंगतात, नदीवरील उंच पुलावरून एखादी आगगाडी पाखरासारखी फडफडते, तर पाण्याखालून एखादी सरपटते !  ह्याशिवाय ट्रॅमवे, आम्नीबस् व साध्या गाड्या ह्यांची तर रस्त्यांत खेंचाखेंची !  अगदीं नुकतीच एक सेंट्रल लंडन रेलवे म्हणून ८० फूट खोल भुईंतून जाणारी विजेची गाडी झाली आहे.  प्रत्येक स्टेशनावर उतारू लोकांस लिफ्टनें खालीं सोडतात व वर घेतात.  आंतील स्टेशनावर प्रकाशाची व हवेची इतकी सुंदर व्यवस्था केली आहे कीं, वरच्यापेक्षां खालींच बरें वाटतें.  तीन तीन मिनिटांनीं एक गाडी अकस्मात् पुढें येते आणि हजारों लोकांना घेऊन एका मिनिटांत पसार होते.  ही परंपरा सकाळ पासून रात्रीच्या १२ पर्यंत घड्याळांतील कांट्याप्रमाणें नियमानें चालू असते.  लंडनच्या जमिनींत खालीं कोठें काय आहे हें सांगवत नाहीं.  विजेच्या दिव्यांच्या तारा, धुराच्या दिव्यांच्या तोट्या, पाण्याचे बंब, मैल्याचीं गटारें आणि आगगाड्यांचे बोगदें ह्यांनी सगळी जमीन मधमाशांच्या पोळ्याप्रमाणें पोखरली आहे.  खालीं जमिनींत ही नकशी, तर वरतीं हवेंतून टेलिग्राफ व टेलिफोनचें जाळें पसरलें आहे.  जागजागीं टेलिफोनचीं ठिकाणें आहेत.  त्यांतून जरूरीचे निरोप जाऊन लगेच उत्तर येतें; अगर दोघांचे संभाषण चालतें.  ह्याप्रमाणें लंडन नांवाचें २००।३०० चौरस मैल क्षेत्रफळाचें एक सावयवी शरीर आहे !

इंग्लंड हें बोलून चालून व्यापार्‍यांचें राष्ट्र - अर्थात् त्याचें मुख्य शहर म्हणजे सर्व जगाचें एक भलें मोठें मार्केट.  तेव्हां त्यांतील दुकानें पहाण्यासारखीं असतील ह्यांत नवल काय ?  माल तर मोहक खराच.  पण तो दुकानांत मांडून ठेवण्याची ढब त्याहून मोहक.  आमच्याकडील दुकानदार आपल्या मालाचे ढिगाचे ढीग दुकानांत लपवून ठेवून आपण दाराशीं येऊन बसतात. एखाद्यास वाटावें हे जणूं रखवालीच करीत आहेत.  इकडे कांहीं निराळाच प्रकार.  दुकान म्हणजे एक जंगी पारदर्शक पेटी-अथवा पदार्थ संग्रहालय-अगर एक लहानसें प्रदर्शनच.  रस्त्यांतून धांवतांना देखील दुकानांतील सर्व जिन्नस किंमतीसहित दिसतील.  हिंदुस्थानांत मागें एकदां प्रदर्शनाकरितां मेणाचे सुंदर पुतळे आणले होते,  तसले पुतळे येथें प्रत्येक कापडवाल्याच्या दुकानांत उभे केलेले असतात.  आणि त्यांवर दुकानांतील पोशाकाचे मासले चढविलेले असतात.  पुतळ्यांकडे पाहून पोशाक घेण्याची इच्छा सहजच होते.  काळोख पडल्यावर प्रत्येक पदार्थांजवळ एक एक बिजलीची बत्ती चमकूं लागते.  दुकानावरच्या ज्या पाट्या आणि जाहिराती दिवसा शाईनें लिहिलेल्या दिसतात, त्या रात्रीं दिव्यानें अधिक स्पष्ट दिसतात आणि दुकानांस अधिकच शोभा येते.  जाहिरातीनें तर इतका कहर उडवून दिला आहे की पहावे तिकडे अक्षरे, चित्रे आणि पुतळे हीच दिसतात. कित्येक हालतात, कित्येक लकाकतात, तर कित्येक वारंवार आपला रंग बदलतात! शहरास कंटाळून बाहेर पडलो, तर शेतांतून व पिकांतूनही जाहिराती दिसाव्यात काय? भुईखालच्या विजेच्या गाडीकडे जाण्यास मी एकदा लिफ्टमधून खाली उतरत असताना माझी नजर काळोखातून सहज भुयाराच्या भिंतीकडे गेली. तितक्यातच लिफ्टच्या उजेडामुळे भिंतीवर एक जाहिरात दिसली!! अशा ह्या मायावी लोकांपुढे व्यापारात आमचा टिकाव कसा लागेल!

नुसत्या भपक्या-भपक्यानेच ह्यांचा व्यापार इतका वाढला आहे, असे म्हणणे केवळ भ्रममूलक आहे. अनियंत्रित व्यापार आणि कायदेशीर स्पर्धा ह्या तत्त्वाचा ह्या लोकांवर असा फायदेशीर परिणाम झाला आहे की गि-हाईकांशी बेशिस्तपणा, आडदांडपणा, बेविश्वास अगर किमतीत अफरातफर केल्यास व्यापारी आपले भांडवल लवकरच गमावून घेईल. आपल्या पेढीची कोणत्याही प्रकारे बदनामी होऊ नये इतकेच नव्हे, तर लहान-थोर दर्जाच्या कसल्याही गि-हाईकाचे क्षुल्लक बाबतीतही मन दुखवू नये म्हणून दुकानदार हरएक प्रयत्न करीत असतात. एकंदरीत सौंदर्य, बुद्धी आणि नीती ह्या तीनही मुख्य तत्त्वांची समान सांगड घालून दीर्घोद्योग व अचाट धाडस व निश्चळ श्रद्धा ह्यांच्या पायांवर ह्या लोकांनी आपल्या व्यापारशास्त्राची इमारत उभारली आहे म्हणून लंडन शहरास हल्लीचे वैभव आले आहे!

हे लोक स्वार्थी आहेत, सुखार्थी आहेत, जडवादी आहेत इ. समज पुष्कळ शहाण्या लोकांचेही आहेत आणि इकडे आल्यावर ह्यांचे वैभव, ह्यांची चैन आणि फॅशन्स पाहून हेच ग्रह कायम होण्याचा पुष्कळ संभव आहे. इकडील बाजारातील एक-चतुर्थांश तरी माल निव्वळ चैनीचा आहे असे दिसेल. परवा ‘ख्रिस्तमस बजार’ ह्या नावाचे केवळ नाताळाकरिता एक जंगी दुकान मांडण्यात आले होते, त्यात तळघरापासून तो वर चार मजल्यांपर्यंत लहान मुलांस नाताळात नजर करण्याची खेळणी मांडून ठेविली होती. हे लाखो रूपयांचे दुकान पाहून मला वाटले की इंग्लंडातील लहान मुलांनी जर नुसती आपली खेळणी विकली तर हिंदुस्तानातील दुष्काळपीडितांचे प्राण वाचतील! असो, तो भाग वेगळा. पण पाश्चात्य सुधारणेचे सर्व रहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे. पण, पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता येथेच स्वर्ग उतरविण्याची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थसाधल्याबरोबर परमार्थास ते कसे लागतात, हे आम्हांस समजून घेणे आहे. असो. आज इकडील भौतिक प्रकार सांगितला. पुढे साधल्यास एक दोन बौद्धिक आणि नैतिक मासले सांगेन.

लंडन येथील बालहत्यानिवारक गृह

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. ७-३-१९०२
ह्या अफाट शहराच्या मध्यभागी गिल्डफर्ड रस्त्यातून एके दिवशी जात असता एक भव्य व जुनी इमारत दिसली. तिचे दारावर लिहिलेले वरील नाव वाचून मला आत जाण्याची इच्छा झाली. पण सोमवारीच हे गृह प्रेक्षकांकरिता उघडे असते म्हणून एका सोमवारी ओळखीचे पत्र वगैरे मुद्दाम काही न नेता बरोबर एका सोबत्यास घेऊन पहावयास गेलो. रस्त्यातील फाटक ओलांडल्यावर विस्तीर्ण आणि स्वच्छ पटांगण लागले. त्यातून चिटणीसांचे कचेरीत गेल्यावर आम्हांला सर्व गृह हिंडून दाखविण्याकरिता आम्हांबरोबर एका चौदा वर्षाच्या हुषार मुलास दिले. ह्या छोक-याने आम्हांस मोठ्या व्यवस्थेने चित्रांची खोली, कमिटी बसावयाची जागा, म्युझिअम इ. दाखविल्या आणि प्रत्येकाची थोडक्यात चटकदार माहिती दिली. कमिटीच्या खोलीतील एका मोठ्या सुंदर तसबिरीत ख्रिस्ताजवळ काही लहानलहान मुळे खेळत होती, तिचे खाली हे सोन्याचे वाक्य बायबलातून लिहिले होते. “लहानग्यास मजकडे येऊ द्या, कारण अशाकरिताच देवाचे राज्य आहे,” चित्रांच्या खोलीत हॅडल आणि हॉगर्थ ह्यांची प्रख्यात चित्रे ठेविली होती. म्युझिअममध्ये कित्येक मिशन-यांकडून मुलास नाताळ निमित्त बक्षिस देण्यास पुस्तके व इतर चिजा मिळालेल्या मांडून ठेविल्या होत्या. मध्यभागी एका गोल टेबलावर कोणा एका मोठ्या एडिटराने दिलेल्या बाहुल्या, फुले, माळा, खेळणी, कोनाकृती रचून ठेविल्या होत्या. ह्यानंतर आमच्या चिमुकल्या वाटाड्यने आम्हांस भोजनगृहात नेले. १०० मुले रांगेने दोन्ही बाजूने बसतील असे एक लांब टेबल होते.

५|७ मुले नाताळासाठी भोजनगृह सुशोभित करण्यात अगदी गर्क झाली होती. ती सर्वच आम्ही आत गेल्याबरोबर आम्हांजवळ आनंदाने हासत हासत आली. भिंतीवरच्या एका फळीवर जाड अक्षरांनी लिहिलेली १०-१२ नावे आम्हांला मोठ्या अभिमानाने दाखविण्यात आली. ती नावे दक्षिण आफ्रिकेच्या लढाईत बँड वाजविण्यास नुकतेच पाठविलेल्या ह्यांच्या बंधूंची होती. एका पोटी जन्मलेल्या भावांमध्येदेखील क्वचित बाबतीत असा अभिमान आढळणार नाही. ह्याच खोलीत एका कोप-यात मुलांच्या लक्षात सहज भरतील, अशा रीतीने मोठमोठ्या आश्रयदात्यांची नावे लिहिली होती. एकंदर आश्रमाचे तीन भाग केले आहेत. ७ पासून १२ वर्षांच्या मुलांचा एक भाग. ७ पासून १५ वर्षांच्या मुलींचा दुसरा भाग. आणि ३ पासून ७ वर्षांच्या लहान मुला-मुलींचा तिसरा भाग. ह्यांस अनुलक्षूनच इमारतीच्या दोन उभ्या बाजू आणि मधली आडवी रांग अशी योजना केली आहे. एका बाजूस मुलांची खाली जेवणाची जागा, वरती निजण्याची जागा व मागे शाळा आणि दुस-या बाजूस तशीच मुलींची व्यवस्था केली आहे. त्यांस एकमेकांत मिसळण्याची सक्त मनाई आहे. नंतर आम्ही शाळेत गेलो. एकंदर १०० मोठ्या मुलांचे वयाचे मानाने तीन वर्ग केलेले आहेत. तिन्हींचा अभ्यास चालला होता. मुख्य अध्यापकाने सांगितले की मुलांकडून शाळेतील अभ्यास अर्धा वेळ करून घेऊन बाकीच्या वेळात त्यास कसला तरी धंदा आणि विशेषेकरून बँड वाजविण्यास आणि कवाईत करण्यास शिकविले जाते. मुलींस सर्व घरगुती कामे करण्यास शिकवितात. १५ वर्षांनंतर मुलास बहुतकरून लढाईत बँड वाजविण्यास अगर कोणत्यातरी धंद्यात उमेदवारीस ठेवण्यास येते. मुलीस सभ्य कुटुंबात तिच्या हुषारीप्रमाणे नोकरी पाहून देतात, २१ वर्षांपर्यंत मुलां-मुलींवर गृहाची नजर असते. नंतर ती मुखत्यार होतात. अशा प्रकार ह्या गृहात अजमासे १०० मुलगे, १०० मुली आणि १०० लहान बालके इतक्या अनाथांची जोपासना होत आहे. ह्याशिवाय जन्मल्यापासून तो ३ वर्षांपर्यंतच्या सुमारे २०० तान्ह्या मुलांची जोपासना निरनिराळ्या खेड्यांतून गृहामार्फतच होत आहे. ह्यानंतर मुलांस काही प्रश्न विचारल्यावर मग आम्ही बाहेरच्या पटांगणात आलो, इक्यात लहान मुलांचा वर्ग सुटला. दोन दोन मुले हातांत हात घालून रांगेने लांबवर लुटू लुटू चालू लागली. एक पोक्त बाई त्यांस हिंडवीत होती. ह्या चिमुकल्या पलटणीचा ड्रेस अगदी एकसारखा असल्यामुळे पुढे होणा-या लढायातील ह्यात योद्धा कोण होता व त्याची शुश्रुषा करणारी दाई कोण होती हे सहज कळत नव्हते. सर्वांची प्रकृती सुदृढ, चेहेरे प्रफुल्लित दिसत होते. ह्या बाईशी बोलत असता मुलांनी आम्हांभोवती गराडा दिला. सर्वांशीच हात हालविण्यास आम्हांस वेळ नव्हता म्हणून बाकीच्यांनी आम्हांस कोठे तरी नुसता स्पर्श करून आपली तृप्ती करून घेतली!

नंतर आम्ही प्रार्थनामंदिर पाहिले. हे मोठ्या थाटाचे असून ह्यात दोन तीन हजार लोक सुखाने बसतील अशी सोय केली आहे. निजवयाची जागा पाहिली, अगदी लहानापासून तो मोठ्यापर्यंत प्रत्येकास निराळी खाट आणि स्वच्छ, मऊ व उबदार गाद्या आहेत. मागचे बाजूस आजारी मुलांकरिता दवाखाना आहे.

गृहाचा इतिहास
फ्रान्स, हॉलंड देशांतून अशा प्रकारच्या संस्था पाहून येऊन लंडन येथे टॉमस कोरम् नावाच्या एका मोठ्या परोपकारी व्यापा-याने १७३९ त ही संस्था स्थापिली. प्रथम प्रथम जरी दोन महिन्यांच्या खालचीच मुले घेतली जात होती तरी दारावर मुले आणणा-यांची मोठी गर्दी जमू लागली व दंगे व मारामा-याही होऊ लागल्या. ह्याप्रमाणे पुष्कळ अर्भकांस नाइलाजास्तव परत पाठवावे लागत असे. म्हणून १७५६ मध्ये कमिटीने पार्लमेंटकडे मदतीबद्दल अर्ज केल्यावरून दहा हजार पौंडांची मदत मिळाली. येतील तितक्या सर्व मुलांस आत घ्यावे अशी पार्लमेंटची अट होती. म्हणून ह्या संस्थेचा सर्वांस योग्य फायदा मिळावा ह्या हेतूने सर्व देशभर जाहिराती दिल्या आणि प्रांतनिहाय मुले जमा करण्याकरिता योग्य स्थळांची योजना केली. हॉस्पिटलच्या दारावर एक टोपली टांगलेली असे. कोणीही मुलास टोपलीत ठेवून वर्दीची घंटा वाजवून चालते व्हावे असा क्रम चालला. पहिल्याच दिवशी (ता. २ जून १७५६) ११७ मुले सापडली! डिसेंबर ता. ३१ पर्यंत १७८३ मुले आली!! पुढल्या वर्षी ३७२७ मुले जमली!!! अशा दूरदर्शी औदार्याचा काय परिणाम व्हावयाचा तो लवकरच झाला. ह्या व्यवस्थेने पापाचरणास मोठे उत्तेजन मिळाल्यासारखे झाले. शिवाय अशा कोवळ्या वयातील इतक्या मुलांची योग्य व्यवस्था ठेवणे गृहास न साधल्यामुळे पुढील ३ वर्षे १० महिन्यांत जी एकंदर १४,९३४ मुले सापडली त्यांपैकी १०,३८९ मुले बाळपणीच वारली! काही प्रांतांतील कंगालखान्यातील अधिका-यांनी आपला खर्च कमी करण्यास लबाडी अगर जबरी करून बरीच मुले गृहात पाठविली! कित्येक चांगल्या पण दरिद्री आईबापांनी केवळ आपल्या मुलांच्या स्मशानयात्रेचा खर्च वाचविण्यास आपली मरणोन्मुख मुले टोपलीत टाकली!! शेवटी १७६० त पार्लमेंटास ही अट काढून घ्यावी लागली व तिने आपली मुलेही बंद केली. तथापि एकदा आत घेतलेल्या मुलांची अखेर वाताहात होईपर्यंत (१७७०) सर्व खर्च पार्लमेंटास द्यावा लागला. ह्यापुढे गृहाच्या बाणेदार चालकांनी केवळ लोकाश्रयावर नियमात योग्य फेरफार करून हे गृह चालविले.

सांप्रतची व्यवस्था
मूल हवाली करण्यास स्वतःआईनेच आणले पाहिजे. तिला झालेला सर्व खरा प्रकार निवेदन करावा लागतो. काही लटपट केल्यास अर्ज नामंजूर होतो. मूल जन्मेपर्यंत अगर जन्मल्यावर १ वर्षावर अर्ज घेण्यात येत नाही. बाईची इतर बाबतीत वर्तणूक चांगली आहे, हल्ली तिची दशा कठीण आहे, ज्या पुरूषाने तिजवर हा प्रसंग आणिला त्याने तिला फाटा दिला आहे वगैरे नाजूक गोष्टींची पूर्ण चौकशी केल्यावर कमिटी अर्ज मंजूर करिते. आणि असे केल्याने केवळ मुलाचेच प्राण वाचवून त्याची जोपासना करिते असे नव्हे तर त्या बाईलाही सन्मार्गास लावून समाजात मिसळविते. ही सर्व नाजूक कामे पोक्त व थोर अशा माणसांची कमिटी स्वत:च सक्तपणे करिते. मुलास फुकट घेण्यात येते इतकेच नव्हे तर, गृहाच्या कोणत्याही अधिका-याने कसलीही फी अगर खुशी घेतल्यास त्यास बडतर्फ करण्यात येते आणिती दिल्याबद्दल अर्जदाराचा अर्ज नामंजूर होतो. विवाहित स्त्रियांची अगर विधवांची मुले घेण्यात येत नाहीत. विधवा विवाहास येथे मुळीच प्रतिबंध नसल्याकारणाने हा नियम योग्यच आहे.

हल्ली गृहात मुले-मुली मिळून ३२३ आहेत व निरनिराळ्या खेड्यांत २१९ तान्ही मुले दायांजवळ ठेविली आहेत. सर्दावर्दीने प्रत्येक मुलामागे एकंदर खर्च सालीना २९ पौंड १४ शिलिंग ११ पेन्स येतो. १९०० साली ५५३ मुलांपैकी खेड्यात ६ वारली, गृहात दोन वारली आणि दोन त्यांच्या आप्तांनी नेली.

पापी पण अनुतापी आईच्या पोटी यदृच्छेने आलेल्या इतक्या मुलांचे येथे पोषण व शिक्षण होते. वर सांगितलेल्या सुंदर भोजनालयात ह्यांच्यासाठी दर रविवारी उपासना होतात, त्यावेळी शेजारच्या भागातील भाविक सभ्य स्त्री-पुरूष उपासनेस येतात. उपदेशक पगारी आचार्य आहेत. प्रत्येक वेळी धर्मार्थ फंड गोळा होतो. ह्या प्रकारे धर्माचे खरे लक्षण जो निष्काम परोपकार तो येथे नित्य घडतो! आणि आमच्यासारख्या परस्थास ह्या लोकांची एका दगडासरशी दोनचार पांखरे पाडण्याची वेमालूम तोड पाहून भारी कौतुक वाटते. मुले काम करण्याच्या लायकीची झाली म्हणजे त्यांना योग्य कामे व नोक-या लावून देतात. आणि २१ वर्षांची होऊन मुखत्यार झाली म्हणजे वर्षातील एका नियमित रविवारी त्यांच्या आभार प्रदर्शनासाठी म्हणून एक थाटाची उपासना होते. त्यावेळी कोणा तरी नामांकित बिशपचा उपदेश होतो. मुलांच्यातर्फे आभार मानल्यावर त्यास बक्षिसे वाटून शिवाय चांगल्या वर्तणुकीबद्दल प्रेसिडेंटच्या सहीची शिफारसपत्रे मिळतात. गतसाली ड्यूक ऑफ पोर्टलंड (उपाध्यक्ष) ह्यांनी बक्षिसे वाटली. ह्या प्रकारे अत्यंत सोवळे धर्माधिकारी व बडेबडे जातिवंत मानकरी ह्यांनादेखील ह्या संस्थेशी प्रत्यक्ष संबंध ठेविण्यात मुळीच लांछन वाटत. नाही!! गृहाच्या म्युझिअममध्ये दोन..... हृद्यात बाणासारख्या घुसणा-या मूर्ती ठेविल्या आहेत, त्या अशा-प्रस्थापक परोपकारी टॉमस् कोरम ह्यांची वयाने वाकलेली गंभीर मूर्ती उभी आहे. त्यांच्या डाव्या हातात नुकतेच जन्मलेले बालक खेळत आहे. त्यांच्या पायाजवळ पश्चात्तापाखाली चुरडून गेलेल्या एका तरूण व मुग्ध पोरीने गुडघे टेकिले आहेत. तिने आपले शरमिंधे तोंड एका हाताने घट्ट झाकलेले आहे. कोरम साहेब मात्र दुस-या हाताने शेक हँड करीत आहेत! इकडे मुलाने कोरम साहेबांच्या वासकुटाची गुंडी घट्ट धरली आहे! जणू काय, त्यांच्या परोपकाराचा फायदा ते हक्काने मागीत आहे!!

असो, अशा संस्थांचा उत्कर्ष होणे इष्ट आहे असे मुळीच नव्हे. पण मानवी स्वभावाची पूर्णता होईपर्यंत ह्या संस्था सर्व देशांत अवश्य आहेत, असे कष्टाने म्हणावे लागते. विधवा-विवाहास पूर्ण संमती असूनही ह्या देशात असा संस्थांची गरज भासत आहे, हे सुधारकांनी ध्यानात घेण्यासारखे आहे. आणि नुसती गरज आहे असे म्हणून स्वस्थ न बसता आज शेकडो वर्षे ही एकच नव्हे तर अशाच दुस-या अनेक संस्था ह्या एका लंडन शहरात चालू आहेत, ही गोष्ट, बालविधवांनादेखील शास्त्रोक्त विवाह करण्याची जेते सक्त मनाई आहे, तेथील सदय धर्माभिमान्यांनी लक्षात आणावी.

जे का रंजले गांजले| त्यासी म्हणजे जो आपुले||
तुका म्हणे सांगो किती| तोचि भगवंताची मूर्ति ||

कित्येक प्रत्यक्ष कृती करून तुकारामाचे भगवंत बनतात! कित्येक नुसता त्यांचा उपदेश ऐकून माना डोलवितात! कित्येक कसल्हाही भानगडीत पडत नाहीत! आणि कित्येक तर प्रार्थनासमाजाने असलीच एक संस्था पंढरपुरास चालविली आहे, म्हणून त्याच्यावर दांत ओंठ खातात !

  1. राष्ट्रीय निराशा
  2. राज्यारोहण
  3. राजा राममोहन रॉय
  4. राजशासन
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101
Page 97 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी