1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

युनिटेरिअन समाज

पूर्वपीठिका व इतिहास
हिंदुस्थानात ज्याप्रमाणे ब्राह्म अगर प्रार्थनासमाज आणि आर्यसमाज ह्या उदार धर्माच्या संस्था पुरातन हिंदुधर्मातून विकास पावून, आधुनिक शास्त्र, तत्त्वज्ञान व विचारपद्धती ह्यांस विसंगत न होता ज्या एका सनातन व सार्वत्रिक धर्माचे कार्य करीत आहेत त्याच धर्माचे कार्य युनिटेरिअन समाज हा इंग्लंड, अमेरिका इ. सुधारलेल्या पाश्चात्य देशांत करीत आहे.

युनिटेरिअन ह्या इंग्रजी पदाचा अर्थ एकवादी असा हे. १६ व्या शतकात ख्रिस्ती धर्मात जी मोठी सुधारणा झाली त्यानंतर हे नाव प्रचारात आले. पण ह्याचा खरा अर्थ कळण्यास ख्रिस्ती धर्माच्या अगदी मुळाशी गेले पाहिजे. ख्रिस्ती लोक जरी देव एकच आहे असे मानतात, तरी त्याचे तीन पुरूष आहेत अशी त्यांची समजूत आहे. पितादेव, पुत्रेदेव (ख्रिस्त), पवित्र आत्मा हे त्रयात्मक कोडे प्रचलित ख्रिस्ती धर्माचे केवळ जीव आहे. ह्या कोड्यावर ज्यांचा विश्वास नाही ते जुन्यांच्या मते ख्रिस्ती नव्हेत व त्यास पुढे गतीही नाही. ह्याच्या उलट युनिटेरिअन लोक परमेश्वर सर्वतोपरी एकच आहे व ख्रिस्त हा केवळ एक अतिपवित्र साधुपुरूष पण इतरासारखा मनुष्य होता असे समजतात. ख्रिस्ती श्रुतीचे व धर्मेतिहासाचे काळजीपूर्वक संशोधन केल्यास ति-हाइताला सहज दिसून येईल की, हा कूटात्मक त्रयवाद मुळात नसून ख्रिस्तानंतर सुमारे ३०० वर्षांनी धर्माधिका-यांनी काही कारणास्तव आत घुसडला आहे. स्वत: ख्रिस्तास अगर त्याने नेमलेल्या बारा संदेशकांस हे कोडे माहीत नव्हते. त्यांच्या शिकविण्यात ह्याचा उल्लेख नाही हे साहजिक आहे. मागाहून सेंट पॉल ह्यास संदेशक नेमण्यात आले. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्ताच्या खालोखाल पॉल ह्याने अति मोठी कामगिरी बजाविली आहे. किंबहुना पॉल झाला नसता, तर ख्रिस्ताने केलेले धर्मविधान जुन्या यहुदी धर्माचाच केवळ एक सुधारलेला पंथ बनून थोड्या काळात नामशेष झाले असते. ख्रिस्ताप्रमाणे त्याचे बाराही संदेशक यहुदीच होते. ख्रिस्ताचा उपदेश ऐकूनही त्यांची मने व्हावी तितकी उदार झाली नव्हती. त्याने दिलेल्या सार्वत्रिक देणगीचा फायदा यहुदी तर बाह्य जगास देण्यास तयार नव्हते व समर्थही नव्हते. पण स्वभावत: हिंमतवान पॉल ह्यास ख्रिस्ताने तरी संदेशक नेमले नव्हते, तरी त्याच्या अतिरिक्त चांगुलपणाने त्यास झपाटले होते. त्या प्रेरणेसरशी पॉल बेफाम झाला. आणि यहुदी कोतेपणाचा कोट फाडून, ग्रीक, रोमन, मॅसिडोनियन इ. लोकांत त्याने शुभवर्तमानाची दवंडी पिटविली. ह्या प्रकारे शुभवर्तमानाचा चोहोंकडे प्रसार झाला खरा, पण त्यासरसा त्याच्या शुद्ध साधेपणाला बराच बाध आला. ग्रीक, अलेक्झांड्रियन्, वगैरे लोक स्वभावत:च तत्त्वज्ञानपटू व तर्कप्रिय. येथील ब्राह्मणांनी ह्याच्या पूर्वीच अध्यात्मशास्त्रात पुष्कळ सिद्धांत व कोटिक्रम केले होते. ख्रिस्ताचे शुभवर्तमान व विचित्र चरित्र हे विषय पुढे आल्यावर ख्रिस्त नंतर पहिल्या तीस शतकांत त्याच्या जन्माविषयी व स्वरूपाविषयी नाना मते, नाना उपपत्त्या आणि तदनुसार परस्पर विरोधी पंथही उद्भवले. ग्रीक तत्त्वज्ञांनी ख्रिस्त म्हणजे शब्दब्रह्म (Logos) असे ठरविले. इतरांनी त्यावर आपला अवतारवाद लादला. शेवटी ह्या मतांची व पंथांची इतकी गर्दी व मारामारी झाली की, ख्रिस्ती धर्माच्या अभिषिक्त अधिका-यास धर्माचे मुख्य विधान कोणते, ते कायम कसे राखावे आणि त्याची अमलबजावणी कशी करावी ह्याची मोठी काळजी पडली. ह्याच संधीस कॉन्स्टॅटिनोपलचा रोमन बादशहा कॉनस्टॅन्टाइन हा राजकीय हेतूने ख्रिस्तीधर्माकडे वळला होता. त्याला ही ख्रिस्तीधर्माची डळमळणारी इमारत सावरावयाची होती. म्हणून त्याने इ. स. ३२५ साली नायसिया येथे मोठी धर्मपरिषद भरविली. तीत सर्व धर्माधिकारी विवादक जमले होते. त्यांनी अर्धा वाद, अर्धी जबरी करून शेवटी वरील कूटात्मक त्रयवाद (Trinity) स्थापला. पण एवढ्यानेच हा ख्रिस्ताच्या स्वरूपाविषयी वाद मिटला नाही. एरियस आणि त्याचे अनुयायी ख्रिस्ताचे मनुष्यत्व वेळोवेळी प्रतिपादू लागले. शेवटी रोमचा पहिला पोप लिओ दि ग्रेट ह्याने फर्माविले की, ख्रिस्त हा पूर्ण मनुष्यही आहे आणि पूर्ण देवही आहे. मेरीच्या पोटी जन्मला म्हणून मनुष्य, आणि मेरी ही कुमारी होती तिच्यात गर्भ देवापासून आला म्हणून तो देव, इ. ह्या अवधीत रोमच्या मठाचा अधिकार पूर्ण स्थापित झाला होता. पोपच्या हाती स्वर्गाच्या किल्ल्या आल्या होत्या. इतकेच नव्हे, तर युरोपच्या राजकीय गाद्यांचा मक्ताही त्याने आपलेच हाती घेतला होता. ह्या राजकीय व सामाजिक एकछत्री राज्याची पुढील एक हजार वर्षे युरोपच्या इतिहासात अंधरायुग ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. धर्माची मते, समाजाची कृत्रिम बंधने व व्यक्तीचे आचार ह्याचे जे एकदा कायमचे ठसे बनून गेले ते पुढील हजार वर्षांत कोणाच्यानेही पुसवले नाहीत.

१६ व्या शतकात लूथर आणि कॅलव्हिन ह्या पराक्रमी पुरूषाचा उदय झाला. त्यांनी पोपचे प्रामाण्य, त्याच्या हस्तकांचा जुलूम, प्रायश्चित्ताचा बाजार वगैरे अनेक अधर्माविरूद्ध धर्मयुद्ध करून अर्ध्या अधिक युरोपचा उद्धार केला. पण लूथर अगर कॅलव्हिन हे काही पूर्ण सुधारक नव्हते. (कोणाही एका व्यक्तीस सुधारणेत पूर्ण यश मिळविणे फार कठीण आहे.) ह्या दोघांनी पोपचे प्रामाण्य हाणून पाडले, पण कॅथॉलिक मताने ४ थ्या ५ व्या शतकांत धर्ममताचे जे ठसे जुळवून ठेविले होते ते जसेच्या तसेच स्वीकारले, इतकेच नव्हे तर ह्या दोघांनी आपल्या नवीन अधिकारबळाने वरील मतांचे प्रामाण्य गाजविले. सुधारलेल्या धर्मात श्रुती शब्दश: प्रमाण झाल्या. इतकेच नव्हे तर त्या शब्दांचा अर्थही वरील मतास अनुसरूनच करणे भाग पडले. परंतु ह्या सुधारणेमुळे धर्मबाबतीत स्वतंत्र विचाराची जी एकदा लाट उसळली ती अशी मध्येच थांबविणे शक्य नव्हते. साधुसंतांच्या मूर्तीची पूजा बंद केली, प्रायश्चित्ते विकण्याची चाल बंद केली, बायबलाची सुधारून नवी आवृत्ती काढली तथापि काही विचारी माणसांचा उपदव्याप राहिला नाही. ख्रिस्त हा मनुष्य की देव, केवळ त्याच्यावर विश्वास ठेविल्याने मोक्ष मिळतो की सत्कर्म केल्याने मिळतो, मनुष्यप्राणी जन्मत:च पापी आहे काय, क्ही आत्म्यांस गती व काहीस अधोगती ही देवाने आधीच निवडानिवड केली आहे हे खरे काय, वगैरे जुन्या प्रश्नासंबंधी पुन: विचार सुरू झाला. पण लूथर आणि कॅलव्हिनने ह्या बाबतीत अगदी दुराग्रह धरला. इ. स. १५३९ साली कॅथराईन वीगल नावाच्या एका वृद्ध बाईस ह्यासंबंधी स्वतंत्र विचार केल्याबद्दल जिवंत जाळण्यात आले. सर्व्हिटस् नामक एका स्पॅनिश डॉक्टराने ‘ख्रिस्ती धर्माचा उद्धार’ ह्या नावाचा एक स्वतंत्र विचाराचा ग्रंथ लिहिला. म्हणून त्यास पाखंडी ठरवून कॅलव्हिन ह्या सुधारकाने इ. स. १५५३ त जिवंत जाळविले. सर्व्हिटस् हा पहिला नावाजलेला युनिटेरिअन होय.

पोलंड, ट्रान्सिल्व्हानिया व हंगेरी
हॅलॅमने म्हटले आहे की, सर्व्हिटसच्या राखेतून धर्मसहिष्णुतेचा पहिला अंकूर उगवला. सर्व्हिटसच्या मागे ब्लँड्राटा नावाच्या एका इटालियन वैद्याने युनिटेरिअन मताचा प्रसार पोलंड देशात चालविला. हा देश जरी कॅथॉलिक होता तरी त्यावेळी तेथे पहिला व दुसरा सेजिस्मंड असे युरोपातील तेवह्चे अत्यंत उदार मताचे राजे होते. त्यांनी धर्मबातीत पूर्ण स्वातंत्र्य राखिले होते. म्हणून ब्लँड्राटा ह्यास पोलंडात इ. स. १५६५ साली पहिला युनिटेरिअन समाज स्थापिता आला. लवकरच सर्व देशभर ह्याच्या शाखा निघाल्या. इतर ठिकाणचे युनिटेरिअन्सही तेथील छळाने गांजून येथे आश्रयासाठी जमू लागले. राको येथे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे कॉलेज काढले. शेजारच्या ट्रान्सिल्व्हानिया व हंगेरी ह्या देशांतही ह्या मताचा झपाट्याने प्रसार होऊन त्यात अनुक्रमे ४०० व ३७ समाजांची स्थापना झाली, आणि क्लॉसेनबर्ग येथे एक मोठे कॉलेज निघाले. पण ह्याचा हा उत्कर्ष फार वेळ टिकला नाही. ज्या दोन उदार राजांमुळे ह्यांना अवसर मिळाला होता ते दोघे १५७१,१५७२ साली वारले व त्याच्यामागे कॅथॉलिक कारकीर्द सुरू झाली. जुने दुर्धारक कॅथॉलिक्स नवे सुधारक म्हणविणारे पण तितकेच दुराग्रही व असहिष्णु लूथर व कॅलव्हिन ह्यांचे अनुयायी ह्या दोघांसही हे युनिटेरिअन उदार मत खपण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांचा दोहोंकडूनही छळ होऊ लागला. इ. स.१६३८ साली पोलंडातील त्यांचे कॉलेज पाडून टाकले. अध्यापकांस हद्दपार केले आणि उपासनामंदिरे बंद करण्यात आली. १६६० त त्यांचा तेथे पूर्ण बीमोड झाला. त्यांची मते स्वीकारणा-यास अगर कोणा युनिटेरिअनास घरी आश्रय देणा-यासही देहांत शिक्षेचा हुकूम झाला. हंगेरीतील ३७ समाज नाहीसे झाले, ट्रान्सिल्व्हानियांतील ४०० पैकी १०० समाज कसे तरी जीव धरून राहिले. इ. स. १८५७ साली जेव्हा ऑस्ट्रियाने रोमशी स्नेह जोडला तेव्हा वरील १०० समाजांचा नाश करण्याचा शेवटचा प्रयत्न झाला होता. पण इंग्लंडातील युनिटेरिअनांच्या मदतीने ह्यांचा त्या संकटातून निभाव लागला व आतापर्यंत त्यांची हळूहळू वाढ होत आहे.

इंग्लंड
सोळाव्या शतकात इंग्लंडातही पुष्कळ युनिटेरिअनांची दुराग्रहास आहुती देण्यात आली. इ. स. १५५० साली जोन बौचर नामक एका बाणेदार बाईने ख्रिस्ताच्या अवताराविरूद्ध आपले मत प्रथिपादल्याबद्दल तिला जिवंत जाळले. स्मिथफिल्ड येथे ही चितेवर उभी असताना मरताना तरी तिने आपले मन बदलावे म्हणून एक पाद्रीसाहेब तिच्याजवळ उपदेश करण्यास गेले, पण बाईने ह्या भल्या गृहस्थास घरी जाऊन पुन: एकवार बायबल शांतपणे वाचण्यास सांगितले, व धैर्याने प्राण सोडला. इ. स. १६१२ त शेवटचे दोन बळी पडले. पण माणसाबरोबर मतांची राख झाली नाही. पोलंडातील युनिटेरिअन पुस्तके इंग्लंडात छापवून आणून त्यांचा प्रसार करण्यात आला. १७ व्या शतकात इंग्लंडात प्युरिटन मताचे जे मोठे वादळ झाले त्याच्या तळाशी युनिटेरिअन मताचा प्रवाह जोराने वाहत होता. व्यवस्थितपणे ह्या मताचा समाज जरी तेव्हा स्थापन झाला नव्हता तरी त्या काळचे मोठमोठे विवेचक मिल्टन, लॉक, न्यूटन प्रभृती ह्याच मताचे होते.

१६ व्या शतकातील मोठ्या सुधारणेत इंग्लंडात जरी प्रॉटेस्टंट धर्माची स्थापना झाली तरी लोकांस स्वतंत्र रीतीने विचार करण्यास व उपासना करण्यास सवड नव्हती. राजकीय व धार्मिक बाबती एकातएक अशा मिसळून गेल्या होत्या की सर्व लोकांस राष्ट्रीय धर्माने (Established Church) रेखन दिल्याप्रमाणेच आपले सर्व धर्माचरण राखणे भाग पडत होते. ह्यामुळे चिडून कित्येक लोकांनी आपापल्या स्वतंत्र शाखा काढून आपले व्यवहार व बंधने स्वतंत्र रीतीने पाळण्याचा प्रयत्न केला होता. ह्या लोकांस नॉनकन्फॉर्मिस्ट किंवा डिसेंटर्स असे म्हणतात. १६७९ तील राज्यक्रांतिनंतर ह्या सर्व लोकांस उपासनास्वातंत्र्य मिळाले (Act of Toleration). ह्यापैकी प्रेस्बिटर शाखेचे लोक जेव्हा आपल्यासाठी स्वतंत्र मंदिरे बांधू लागले तेव्हा त्यात उपदेश करणा-यांची मते अमक्याच प्रकारची असावीत अशी त्यांनी अट ठेविली नाही, त्यामुळे ह्या शाखेत युनिटेरिअन मताचा स्वतंत्र विचार झपाट्याने होऊ लागला. युनिटेरिअन हे पाखंडी नाव घेण्याची मात्र ह्या शाखेची छाती नव्हती व इच्छाही नव्हती तथापि नकळत त्यांची ह्या मताकडे प्रगती होत होती.

पण एका धीटास असे लाटेसरशी वाहत जाणे आवडेना. तो त्या काळचा प्रसिद्ध रसायनशास्त्री डॉ. जोसेफ प्रिस्टले हा होय. जी बुद्धी ऑक्सिजन व विद्युत ह्या तत्त्वांची पारख करण्यात तो नेहमी खर्चीत असे तीच आता चालू धर्मतत्त्वांची देखील पारख करण्यात घालण्याचे त्याने धाडस केले, इतकेच नव्हे तर त्याने युनिटेरिअन मतांचा राजरोसपणे पुकारा केला. बिचारी प्रेस्बिटर शाखा चपापून गेली. पण प्रिस्टलेचे तोंड काही केल्याने राहीना. शेवटी प्रेस्बिटर पंथाला आढळून आले की, आपण खरोखरीच युनिटेरिअन आहो. तरी उघडपण ते असे नाव घेईनात. पण जग त्यास ख-या नावाने ओळखू लागले. बाप्टिस्ट व कॉग्रिगेशनॅलिस्ट वगैरे जुन्या मतांच्या शाखा ज्या आतापर्यत त्यांच्याशी व्यवहार करीत होत्या त्यांनी आता व्यवहार बंद केला. हल्ली प्रेस्बिटरेअन लोकांस युनिटेरिअन म्हणवून घेण्याची फारशी लाज वाटत नाही.

ह्याचवेळी इंग्लंडात राष्ट्रीय चर्चमध्येच एक सुधारणेची चळवळ चालू होती. इतिहासात हिला ‘लॅटिट्युडिनेरिअनझम’ असे नाव आहे. ही चळवळ करणा-यास ख्रिस्ती धर्ममतातील पुष्कळ गोष्टी विकसित, मानवी-बुद्धीला अत्यंत अग्राह्य वाटू लागल्या होत्या. हे सर्वही सुधारक स्थापित धर्माचे लहान मोठे अधिकारी होते. त्यांनी शेवटी मतासंबंधी ज्या ३९ प्रतिज्ञा प्रत्येक उपदेशकास हल्ली घ्याव्या लागतात, त्या तशा असू नयेत अशाबद्दल पार्लमेंटकडे अर्ज केला. पण हा अर्ज मुळी स्वीकारूच नये, असे एकास तीन मतांनी पार्लमेंटात ठरले. ह्यानंतर वरील सुधारक मंडळी स्वस्थ बसली. कारण कोणतीही सुधारणा लोकांत राहून व लोकांस घेऊनच करावी असे त्यांचे म्हणणे पडले. पण त्यांपैकी एकाची मात्र अशी सुलभ आणि सोयीची समजूत पडली नाही. तो थिओफिल्स लिंडसे हा होता. त्याने आपले यॉर्कशायरमधले मिळकतीचे आचार्यपद सोडले आणि लंडन येथील एसेक्स स्ट्रीटमध्ये एक जुनी लिलाव करण्याची जागा उपदेश करण्यासाठी स्वत:च्या खर्चाने भाड्याने घेतली. ह्याप्रकारे सन १७७३ साली इंग्लंडातील प्रथम यूनिटेरिअन समाजाची उघडपणे स्थापना झाली. लिंडसेच्या सहकारी लँटिट्युडिनेरिअन सुधारक मंडळीने त्यास पंथ सोडून बाहेर पडून सुधारणा करू लागल्यामुळे सुधारणेस हरकत होणार असा दोष दिला होता. पण काळाने सत्य कोणत्या बाजूस होते हे दाखविले आहे. लिंडसेची सहकारी मंडळी कोण होती ह्याचा आता अगदी विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष त्यांच्या सुधारणेची चळवळ ‘लँटिट्युडिनेरिअनझम’ ही काय होती हे पहाण्यासही आता मागील इतिहासाची पाने शोधावी लागत आहेत, त्यात मात्र तिचे नाव आढळते. उलटपक्षी लिंडसेच्या लिलावाच्या खोलीचे मोठे मंदिर बनले व त्यात थोड्याच काळात राजकीय सुधारक, बॅरिस्टर, शास्त्री व पार्लमेंटचे सभासद वगैरे बडी बडी मंडळी जमू लागली, तथापि सन १८१३ पर्यंत युनिटे रिअन्सविरूद्ध कडक प्रतिबंधक कायद्याची अमलबजावणी होत होतीच. इ. स. १७८६ साली कोणतीही मतासंबंधी अट न घालता धर्माचे स्वतंत्र शिक्षण देण्यासाठी व उपदेशक आणि प्रचारक तयार करण्यासाठी मँचेस्टर कॉलेजची स्थापना झाली. चोहींकडे देशभर समाज निघू लागले. सन १८२५ त इंग्लंडात व बाहेर युनिटेरिअन मतांचा प्रसार करण्यासाठी ब्रिटिश अँड फॉरेन् युनिटेरिअन असोसिएशन नावाची मंडळी स्थापण्यात आली.

अमेरिका
अमेरिका हा नवा देश असल्यामुळे व पारतंत्र्यास कंटाळून बाहेर पडलेल्या लोकांनी वसविलेला असल्यामुळे तेथे राष्ट्रीय स्थापित धर्माचे प्रस्थ माजलेले नाही. लोकसत्तात्मक पद्धतीवर लोकांनी आपापले धर्मसमाज चालविले आहेत. तथापि बहुसमाज अद्यापि वरून तरी जुन्या मताचाच आहे. सन १७८५ साली बॉस्टन येथील एका समाजाने उघडपणे युनिटेरिअन मत स्वीकारले. तेव्हापासून त्याचा तेथे हळूहळू प्रसार होऊ लागला. इकडे इंग्लंडात डॉ. प्रिस्टले ह्यांचा लोकांनी फार छळ मांडला. बर्मिंगहाम् येथील त्यांचे घर जाळले. लंडन येथील त्याला सुखाने राहू दिले नाही. म्हणून त्यास शेवटी त्रासून अमेरिकेत जावे लागले. तेथील लोकांनी त्यांचा बहुमान केला व त्याच्यामुळे तेथे उदारमत-प्रसारास अधिक मदत झाली. मॅसाचसेट्स प्रांती डॉ. चॅनिंगची व्याख्याने सुरू झाली. त्याच्या जोरदार प्रेरणेने त्या प्रांतातल्या सुमारे अर्ध्या समाजांनी हे उदार मत स्वीकारले. पुढे लाँगफेलो लोवेल वगैरे कवी, एमर्शनासारखे लेखक व थिऑडर पार्करसारखे उपदेशक ह्यांनी युनिटेरिअन मत देशभर पसरविले.

असो. एथवर युनिटेरिअन मताची प्रॉटेस्टंट सुधारणेच्या पूर्वीची पीठिका व नंतरचा त्या समाजाच्या १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत त्रोटक इतिहासाचा थोडक्यात विचार केला. ह्यापुढे २० व्या शतकाच्या आरंभी ह्या समाजाची कशी स्थिती आहे व एकंदर जगाच्या धर्मप्रगतीत ह्याची पायरी कोणती आहे हे ठोकळ मानाने पाहू.

हल्लींची स्थिति
युनिटेरिअन समाजाच्या मतौदार्याची मजल हल्ली एकंदरीत कोठवर गेली आहे ह्याची थोडक्यात पण ठाम कल्पना मराठी वाचकांस करून देणे हे मोठे कठीण काम आहे. डॉ. प्रिस्टले व लिंडसे प्रभृती युनिटेरिअन्स व डॉ. मार्टिनो, रेव्ह. आर्मस्ट्राँग प्रभृती अलीकडचे युनिटेरिअन्स ह्यांच्यात महदंतर पडले आहे. जे अंतर आदिब्राह्मसमाज व हल्लीचा साधारण ब्राह्मसमाज ह्यांमध्ये आहे तेच १९ व्या शतकाच्या पूर्वीच्या व नंतरच्या युनिटेरिअन समाजात आढळते. प्रिस्टले इत्यादिकांना प्रचलित धर्माचे हटवाद व ख्रिस्ताचे देवत्व जरी मान्य नव्हते. तथापि ख्रिस्ती धर्म म्हणजे केवळ एक अप्रतिम ईश्वरी सत्य आहे आणि त्याची प्रतीती येशूने अनेक चमत्कार दाखवून मनुष्यास करून दिली असे त्यास वाटत होते. निस्पृह सुधारक थिओडर पार्कर ह्याचेदेखील मन श्रौत चमत्काराबद्दल साशंकच होते. पण हल्ली कोणताही युनिटेरियन केवळ बायबलावरच हात टेकून बसलेला आढळणार नाही. ह्यावरून ते बायबलचा अनादर करतात असे मुळीच नव्हे. तर मनुष्यकृत बायबलात ईश्वरी प्रेरणा किती आहे व मानवी उपाधी व अफरातफर किती आहे ह्याचा ते प्रांजलपणे, दक्षतेने व अत्यादरपूर्वक विचार करितात, इतकेच नव्हे तर धर्म ही बाब केवळ एकाद्या बाह्यप्रणित शब्दांसंबंधी मीमांसा, विचक्षणा अगर चिकित्सा करण्याची नव्हे किंवा केवळ मानसिक विश्वासाचीही नव्हे तर ती अंत:करणाच्या उच्च भावनांची व स्वभावाच्या वाढीची आहे अशी त्यांची दृढ समजूत होऊ लागली  आहे. किंबहुना युनिटेरिअन ह्या शब्दाचा व्यापक अर्थ घेतला तर हल्लीचा युनिटेरिअन समाज हा सुधारलेल्या पाश्चात्य जगाचे ‘प्रबुद्ध अंतर्याम’ (Enlightened conscience) होय असे म्हटल्यास अतिशयोक्ती मुळीच होणार नाही. हल्ली जे ह्या समाजाच्या रूपाने इतके धमौदार्य प्राप्त झाले आहे, ते युरोपात गेल्या शतकात मानवी विचाराची व शोधाची ज्ञानमार्गात जी अभूतपूर्व मजल पोहोचली तिचे प्रत्यक्ष फळ होय. ही विचारगती मुख्यत्वेकरून चार निरनिराळ्या दिशेने झपाट्याने झाली व अद्यापि चालली आहे ती अशी:

(१) पहिली चळवळ अनुभवजन्य शास्त्राची, हिचा आरंभ १९ व्या शतकापूर्वीच झाला होता. पण प्रथम जडशास्त्राच्या विशिष्ट शाखांत लहान मोठे प्रयोग करणे, अनुभव मिळविणे व त्यांचा केवळ भौतिक उन्नतीकडे उपयोग करणे ह्यांतच ही चळवळ खपली होती. पुढे १९ व्या शतकात शास्त्राने तात्त्विक दिशा घेतली आणि अनेक बाह्य प्रमाणांनी डार्विन व स्पेन्सर ह्यांनी उत्क्रांती तत्त्वांची अभेद्य स्थापना करून मोठा दिग्विजय संपादिला.

(२) ह्या अनुभवजन्य ज्ञानाबरोबरच अतींद्रिंय ज्ञानानेही जर्मनीत मोठी मजल मारिली. कँट, हेगल व त्यांच्या अनुयायांनी असा सिद्धांत स्थापिला की विश्वातील भौतिक, मानसिक व नैतिक चमत्कारांच्या तळाशी एकाच स्वयंसिद्ध शक्तीचे कार्य अबाधितपणे चालू आहे.

(३) शास्त्र व तत्वज्ञान ह्यांच्या अशा अभ्युदयामुळे ईश्वरप्रणित मानलेल्या धर्माची इमारत डळमळू लागली. ज्या शास्त्रीय पद्धतीने अनुभविक व तार्किक ज्ञानात इतके कार्य केले तिचा लवकरच धर्माच्या पवित्र व सोवळ्या प्रदेशातही प्रवेश झाला. इतर ठिकाणांपेक्षा जर्मन युनिव्हर्सिटीतील धर्मशास्त्राच्या अध्यापकांना अधिक मतस्वातंत्र्य होते, म्हणून ख्रिस्ती श्रुती जे जुना व नवा करार त्यांतील निरनिराळी प्रकरणे कोणी, कधी, कशा स्थितीत लिहिली, त्यांत ऐतिहासिक भाग किती, व निव्वळ कल्पित व भाविक भाग किती, जुन्या यहुदी धर्माचा परिणाम कोणता व लॅटिन आणि ग्रीक विचारांचा परिणाम कोणता वगैरे गोष्टींची स्ट्रॉस, बॉवर, प्लीडरर इत्यादिकांनी पूर्ण निःपक्षपाताने चिकित्सा केली.

(४) शेवटी अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे तुलनात्मक धर्मशास्त्राचा. युरोपात अनेक जुन्या व नव्या भाषांचा (विशेषेकरून संस्कृताचा) तुलनात्मक अभ्यास सुरू झाल्यापासून जगातील प्रमुख धर्मांच्या सर्व श्रुतिग्रंथांचे मूळ भाषेतून अध्ययन, संशोधन होऊ लागले. प्रो. मॅक्समूलरसारख्या पंडितांच्या विलक्षण उद्योगाने ब्राह्मण, बौद्ध, चिनी, पार्शी, महंमदी इ. पौरस्त्य धर्माच्या पवित्र ग्रंथांचे पाश्चात्य भाषांत भाषांतर झाले. इतकेच नव्हे तर ख्रिस्ती शकापूर्वी ३-४ हजार वर्षांपूर्वीं होऊन गेलेल्या असीरिअन, बाबिलोनियन व इजिप्सिअन् लोकांचे धार्मिक शिलालेख जमिनीतून उकरून काढून त्यांची मीमांसा केली! शिवाय नव्या जगात अगदी अलगपणे विकास पावणा-या मेक्सिको व पेरू ह्या देशांतील धर्माचेही परिशीलन केले. इतक्या विस्तृत प्रमाणांवरून धर्मशास्त्राच्या नवीन इमारतीचा पाया घातला. ह्याप्रकारे शास्त्र, तत्त्वज्ञान, मीमांसा व इतिहास ह्या चारी बाजूंनी हाच सिद्धांत स्थापित झाला आहे की, रानटी अवस्थेतील मानवी आत्म्यात प्रथम जागृती झाल्यापासून आतापर्यंत धर्मबुद्धीचा सारखा विकास होत आहे.

ह्या सर्व गोष्टी घडवून आणणारे युनिटेरिअन समाजाचेच सभासद होते असे नाही. पण युनिटेरिअन समाजाला आता जे स्वरूप आले आहे ते ह्या चारी प्रयत्नांचे प्रत्यक्ष कार्य होय. धर्मबाबतीत उपासना मंदिरातील गीते, प्रार्थना, उपदेश ह्यांची जितकी आवश्यकता आहे तितकीच आवश्यकता वरील चारी प्रयत्नांची आहे अशी त्यांची समजूत असल्याचे त्यांच्या कृतीवरूनही दिसून येते. ह्यामुळे त्यांच्यावर पुष्कळ वेळा असा आक्षेप घेण्यात येतो की, ते केवळ बुद्धिवादी आहेत आणि त्यांच्यात भक्ती कमी आहे. भक्तीसंबंधी आक्षेप बहुतांशी त्या त्या आक्षेपकाच्या भक्तीच्या कल्पनेवर अवलंबून आहे. विश्वात मनुष्यशक्तीहून अनंतपटीने मोठी शक्ती जी नांदत आहे तिजसंबंधी आदर, प्रेम, विनम्र भाव इ. गुण इतरांपेक्षा युनिटेरिअनांमध्ये कमी आहेत असे म्हणता येत नाही. बुद्धिवादाविषयी म्हटले असता ह्यांचा कटाक्ष विशेषेकरून निषेधार्थी आहे. बुद्धीला अग्राह्य वाटणा-या व आत्म्याच्या बुद्धीला केवळ अनावश्यक अशा गोष्टीत जेथे जुने लोक आग्रह धरितात तेथे युनिटेरिअन उदासीन असतात, आणि ज्या गोष्टीत स्वत: जुन्या लोकांचाही खरोखर विश्वास नसता केवळ परंपरागत म्हणून चालू आहेत त्यांचा ते उघडपणे निषेध करतात. वरवर पाहणारास असे दिसते की, साधारण युनिटेरिअन मनुष्य धर्मसमजुतीत निषेधदृष्ट्या बुद्धिवादाचा जितका उपयोग करतो तितका विधिदृष्ट्या करीत नाही आणि काही अंशी हे खरेही आहे. पण ह्याचे कारण त्याच्या बुद्धीची शक्ती निषेधात कुशळ व विधीत पंगू आहे म्हणून नव्हे, तर मागे गेलेल्यांनी बुद्धिवादाचा अतिरेक केल्यामुळे त्यांचे हटवाद जसे आता भोवत आहेत तसेच आताच्यांनी जर आता वाटणा-या शुद्ध बुद्धीच्या सिद्धांताबद्दल आग्रह धरला तर लवकरच त्यांचे हटवाद बनून पुढे येणारास ते जाचतील, इतकेच नव्हे तर आताच्या समाजातही  दुही व भेद माजतील ही गोष्ट ते पक्की जाणून आहेत. म्हणून ते ईश्वराचे गुण, त्याचे व्यापार, त्याचे केवळ स्वरूप, मानवी आत्म्याची मागील व पुढील स्थिती इ. अनाकलनीय गोष्टीसंबंधाने आपले अगदी ठाम मत बनविण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. पण एवढ्यावरूनच जाणिवेला अगदी गुंडाळून ठेवून नुसते हरी हरी म्हणून धर्मसाधन करीत आहेत, असे नव्हे तर मानवी अंतरात्म्यात निरंतर शोधाचा शोष लागला आहे, वेळोवेळी नीतीचा उद्धार होत आहे, बाह्यसृष्टीच्या सौंदर्याची अंतरात रसिकता वाटत आहे, आत्मा आत्म्याशी अधिकाधिक बिलगत आहे, आशा वाढत आहे, मानवी प्रयत्नास अधिक हुरूप येत आहे वगैरे हे जे अंत:चमत्कार त्यांच्या पायावर इंग्लंडात डॉ. मार्टिनो ह्या अध्यर्यूने व त्याच्या युनिटेरिअन अनुयायांनी आस्तिक्यबुद्धीची इमारत रचली आहे. तसेच बाह्यसृष्टीतही अनादी नियमांचे अव्यभिचरित साम्राज्य आणि जीवांच्या व समाजांच्या घटनांचा सतत विकास ह्या गोष्टी ज्या स्पेन्सरसाहेबांनी स्थापल्या त्याचेच युनिटेरिअन अनुयायी मि. सॅव्हेज व जॉन मिस्क ह्यांनी ह्या तत्त्वावर आस्तिक्य मत स्थापिले. (स्पेन्सरचे नाव चहूंकडे बहुतकरून उत्क्रांतिवादापेक्षा अज्ञेयवादाबद्दलच प्रसिद्ध झाले आहे. आणि त्याच्या नावावर कित्येक लोक नास्तिकात तृप्ती पावून उत्साहहीन झाले आहेत. मि. सॅव्हेज ह्यांनी जेव्हा आपला ‘उत्क्रांति धर्म’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला तेव्हा ह्याच स्पेन्सरसाहेबांनी त्यांचे अत्यंत अभिनंदन केले.) ह्याप्रकारे युनिटेरिअन तत्त्वज्ञानातच काय तो बुद्धिवाद आहे असे नाही. तर बहुतेक व्यासपीठातूनही आधुनिक शास्त्राचे व तत्त्वज्ञानाचे शोध आणि राजकीय व सामाजिक उदार घडामोडीविषयी चर्चा व अभिनंदन करण्यात येते. ह्याप्रमाणे युनिटेरिअन बुद्धिवाद निषेधात्मक आहे व विद्यात्मकही आहे. विचाराचा हटवाद व कृतीचे ढोंग आणि अंधपरंपरा ह्यांवर तो आपले निषेधास्त्र चालवितो आणि विचाराची अश्रद्धा, मनाचे औदासीन्य व कृतीचा निरूत्साह ह्यांवर तो आपले विध्यस्त्र सोडतो! विचाराचे पूर्ण स्वातंत्र्य आणि उपासनेचा सोहळा ह्या दोहोंचे दुर्लभ सख्य युनिटेरिअन देवळांतून नित्य घडत असलेले पाहूनही युनिटेरिअन लोकांत भक्ती नाही असे कोण म्हणत असतील तर असोत !

शेवटी ह्यांच्या नावसंबंधी थोडा उलगडा करणे इष्ट आहे. कित्येकांस आपल्यास युनिटेरिअन ख्रिश्चन म्हणून घेणे आवडते, कित्येकांस युनिटेरिअन हेच नाव बस्स आहे. काहींची ही दोन्ही नावे आपल्या मताला अगदी थोटी आहेत अशी कुरकुर आहे. पण कोणाचा कोणत्याही नावात आग्रह नाही. ज्यांना ख्रिश्चन म्हणून घ्यावे असे वाटते त्यांचे म्हणणे एवढेच आहे की, ख्रिस्तीधर्माशी आपला जो ऐतिहासिक संबंध आहे तो हे नाव टाकल्याने तुटल्यासारखा होईल. त्यांना ‘युनिटेरिअन्’ एवढेच म्हणून घ्यावेसे वाटते, त्यांच्या मनात ख्रिस्ती हा जगातील अनेक धर्मशिक्षकांत अगदी वरिष्ठ शिक्षक होय असे ते मानतात व उपासनेत बहुतेक प्रसंगी बायबलाचाच उपयोग करितात. तथापि ह्यांची प्रवृत्ती श्रौत धर्मातून उत्तरोत्तर नैसर्गिक धर्माकडे झपाट्याने होत आहे. आणि तुलनात्मक धर्माध्ययनामुळे युरोपात इतर धर्मग्रंथांचा जसजसा जास्त प्रसार होईल तसतसे इतर धर्मविभूतींचे व धर्मविचारांचे साधारण लोकांनाही अधिक महत्त्व समजून येईल. आणि ते समजून घेण्याची सर्व समाजाची इच्छा आहे इतकेंच नव्हे तर प्रयत्नही चालू आहेत.

मुरळी

मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानांतील हिंदु देवळांतील अनीतिमूलक आणि बीभत्स प्रकार
(आक्टोबर १९०७ च्या प्युरिटी सर्व्हंटच्या मासिकांत इंग्रजीमध्यें प्रसिद्ध झालेल्या लेखाचें भाषांतर)

हिंदू देवळांना लहान मुली वहाण्याचा किंवा हिंदू देवांशी त्यांचा विवाह करण्याचा जो चमत्कारिक प्रघात ह्या देशात पुरातन कालापासून चालत आला आहे, त्याचे मूळ काय आणि त्याची वाढ कशी झाली आहे ह्याविषयीचा इतिहास उपलब्ध नाही. बहुतकरून ही चाल वांझ बायका आपल्याला मुले व्हावीत म्हणून जे देवभोळेपणाचे नवस करीत असतात त्यामुळे किंवा तरुण आणि धर्मभोळ्या बायकांच्या धर्मवेडामुळे ही चाल बहुतकरून अस्तित्वात आली असावी. धर्माच्या इतिहासात काही प्राचीन राष्ट्रांमध्ये धर्माच्या नावाने व्यभिचार करण्याचा एक दुष्ट प्रकार होता, त्यामुळे ही चाल पुढे पडली असेल असे एकाद्या भावी इतिहास संशोधकाने शोधून काढीपर्यंत ह्या विचित्र चालीचे मूळ असे अज्ञात रहाणार आहे. एका ग्रंथकाराने म्हटले आहे “हिरॉडोटस आणि स्टॅबो ह्यांच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की मायलेटा (ग्रीक लोकांची अफ्रोडाइट) देवीच्या देवळामध्ये प्रत्येक तरुण मुलीने एकदा तरी व्यभिचार करावा अशी चाल आसिरिअन आणि बाबिलोनियन ह्या प्राचीन राष्ट्रांमध्ये होती”. ह्या चालीचे दुष्ट प्रकार आम्हांला हिंदुस्थानातील मोठमोठ्या देवळांतू आणि तेथून सर्व हिंदुसमाजामध्ये पसरत असलेले अद्यापि दिसून येतात. हे प्रकार इतर ठिकाणांपेक्षा मद्रास इलाख्यामध्ये फार आढळतात. अबेडुबॉय ह्याने आपल्या ग्रंथात (पान ५९२ ते ६०४) वर्णिलेले बीभत्स प्रकार हल्लीच्या सुधारलेल्या मनूमध्ये दक्षिण प्रांती अद्यापि किती चालले आहेत हे चव्हाट्यावर मांडण्याचे तिकडील लेखकाचे काम आहे. पश्चिम हिंदुस्थानात ही चाल दक्षिणेतूनच आली असावी. जरी इकडे तिकडच्या इतके दुष्ट प्रकार दिसून येत नाहीत आणि जे आहेत तेही हळूहळू कमी होत आहेत तरी पण तेवढ्यावरून समाजामध्ये ह्या बाबतीत जे दुर्लक्ष दिसून येत आहे, किंवा नुकत्याच सरकारने ह्या बाबतीत प्रसिद्ध केलेल्या पत्रव्यवहारामध्ये ‘चालले आहे ते ठीक आहे’, असा जो ध्वनी निघत आहे तो क्षम्य आहे, असे होत नाही. काही सन्मान्य पुढा-यांनी ह्या बाबतीत जो सरकारकडे अर्ज केला आणि त्याला सरकारने ज्या अधिका-यांच्या मतामुळे बादशाही उत्तर देऊन वाटेस लाविले त्यापैकी पुढील एक मासलेवाईक मत पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने दिले आहे. ‘देवाला आपल्या मुली वाहण्याची चाल हिंदुसमाजाच्या खालच्या वर्गातच दिसून येत आहे, आणि ती देखील अर्जदार म्हणतात तितक्या मोठ्या प्रमाणावर नाही. गेल्या दहा वर्षांत मुरळ्यांची संख्या १००० वरून ३०० पर्यंत आली आहे असे सांगतात. शिक्षणाचे प्रमाण जसजसे वाढत आहे तसतसे ही चाल कमी कमी होत आहे. परंतु ज्या लोकांमध्ये ही चाल आहे त्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार फार हळू होत असल्यामुळे ही चाल हळूहळू कमी होत आहे. शिवाय हेही लक्षात घेण्यासारखे आहे की ही चाल खंडोबा आणि इतर अशी देवस्थाने ज्या भागात आहेत तेवढ्याच भागात चालू आहे. ह्यावरून हे उघड होत आहे की ही चाल बंद करण्यासाठी सरकारने तीव्र उपाय योजावे अशी हिची मोठी व्याप्ती नाही’.

मुरळ्यांची संख्या पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने वर सांगितल्याप्रमाणे खरोखर १००० पासून ३०० वर आली असली, तरी दुस-या नावाने इतर देवळांत वाहिलेल्या इतर असंख्य बायकांचा प्रश्न शिल्लक राहिलाच.

तक्ता नं १ (PDF साठी येथे क्लिक करा)

आता ह्या चालीची व्याप्ती आणि धर्माच्या नावाने दुराचार करणा-या बायकांची नक्की संख्या हे सांगणे कोणाही खासगी गृहस्थाला शक्य नाही. तो अधिकार खानेसुमारीच्या खात्यासच आहे. पण ह्या ठिकाणी लक्षात ठेवावयाची गोष्ट ही आहे की, अशा बायकांना मुरळी हेच नाव नाही. निरनिराळी नावे धारण करून निरनिराळ्या देवळांशी संबंध असणा-या किंवा कोणत्याही देवळाशी संबंध नसणा-या असंख्य बायका आपले निरनिराळे संप्रदाय चालवीत आल्या आहेत. महाराष्ट्र, कारवार, कोकण आणि कर्नाटक ह्या भागांतील किती मोठ्या प्रदेशात ही चाल चालू आहे, हे खालील कोष्टकावरून कळून येईल.  

तक्ता नं २  (PDF साठी येथे क्लिक करा)

वर सांगितलेल्या खानेसुमारीच्या कोष्टकावरून दिसून येईल की, दुराचारी माणसांची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये शेकडा १३ नी वाढली आहे आणि कसबिणींची संख्या शेकडा ५० नी वाढली आहे. पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी वर सांगितल्याप्रमाणे मुरळ्यांची संख्या शेकडा ३० नी कमी झाली आहे व खानेसुमारीच्या वरच्या कोष्टकान्वये एकंदर वेश्यांची संख्या शेकडा ५० नी जास्त झाली आहे, तर ह्या दोन गोष्टींचा मेळ बसविण्याची जादू नुसत्या शिक्षणाच्या कांडीने कशी साधावी ! म्हणून मॅजिस्ट्रेटसाहेबांच्या सांगण्याविषयी जबर शंका येत आहे. शिवाय ज्यांना म्हणून हिंदुस्थानातील व्यभिचाराच्या कारणांची थोडीशी तरी माहिती आहे, त्यांना कळून येईल की मुंबई इलाख्यातील वेश्यांची एकंदर संख्या १,७५,२८४ आहे, त्यांपैकी ३०० पेक्षा जास्त मुरळ्या खात्रीने असाव्यात. शिवाय केवळ शिक्षणप्रसारानेच मुरळया नाहीशा होतील असे समजणे म्हणजे शिक्षणाने देशातील चोर भामटेही नाहीसे होतील, असे समजण्यासारखेच व्यर्थ आहे. पोलीस खात्याच्या ऐवजी केवळ शिक्षण खात्याचीच योजना करून जर चोरी आणि भामटेगिरी बंद करता येत नाही, तर त्या खात्याकडून बेकायदेशीर आणि अनीतिपर चाली व त्यामुळे उघड होणारा व्यभिचार तो कसा बंद होणार ! सर्वच व्यभिचार बंद करणे हे शक्य नाही, तरी पण त्याची जी कारणे बंद करण्यासारखी आहेत, ती करू नयेत असे होत नाही. तथापि “जोपर्यंत वेश्यांकरिता मागणी आहे तोपर्यंत ह्या चालीमुळे नाही तरी, दुस-या कारणावरूनच वेश्यांचा पुरवठा होणारच” असे एका फरडेशाही अधिका-याने आपले मत दिले आहे व तशाच मताचा परिणाम काही अंशी सरकारवर घडून त्यांनी वरील सन्मान्य अर्जदारांना जबाब दिला आहे असे दिसते. मागणीवरून पुरवठा होतो, हे जरी खरे आहे तरी पुरवठ्यावरून अधिक मागणी येते, हेही विशेषतः निदान ह्या बाबतीत तरी दुप्पट खरे आहे. आणि शिवाय वेश्या म्हणजे तिच्या बाहेरील मागणीसाठी करविला जाणारा केवळ निर्जीव मालच नव्हे, तर ती स्वतः सजीव मागणीही आहे. ती नवीन पुरवठ्याला उत्पन्न करिते. शिवाय देवाला वहाण्याच्या चालीचे अप्रत्यक्ष रीतीनेही दुसरे अनिष्ट परिणाम होतात. चांगल्या आईबापाच्या मुली देवाला वाहिल्यामुळे कसबिणी होतात. इतकेच नव्हे तर ज्या अगोदरच वेश्या होऊन बिघडलेल्या असतात. त्या आपला धंदा अधिक प्रतिष्ठित रीतीने चालावा मग तो खालच्या लोकांत का होईना आणि समाजामध्ये आपला अधिक राजरोसपणे शिरकाव व्हावा म्हणून त्या कोणताही विशेष प्रकारचा विधी न करता मुरळ्या बनतात. मुरळ्या वहाण्याच्या ह्या दुष्ट चालीच्या प्रतिकारार्थ इंडिअन पिनल कोडाची ३७२ आणि ३७३ ही कलमे असूनही ही चाल अद्याप राहू दिली गेल्यामुळे त्या चालीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुष्ट परिणाम झाले आहेत. ही चाल अद्याप तशीच राहण्याची दोन कारणे अशी आहेत की तिच्या उलट जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी सक्तीने होत नाही व ह्या चालीच्या उलट, जोराचे लोकमत प्रक्षुब्ध केले जात नाही. ही चाल केवळ खालील जातीमध्येच आहे म्हणून तिच्या संबंधाने काही तीव्र उपाय योजण्याचे कारण नाही असेही दाखविण्यात आले आहे. मुरळी अथवा जोगतीण ही स्वतः कदाचित खालील जातीतील बाई असेल पण तिच्या मोहपाशात सापडणारे किंवा तिचा फायदा घेणारे सर्वच पुरुष खालील जातीचे असतात कशावरून ! एका वेश्येमागे म्हणजे निदान पाच दहा बदफैली पुरुष हे प्रमाण उघडच आहे. ते सर्व खालील जातीतील असतीलच कशावरून ! आणि ते जरी असले तरी तेवढ्यावरून हे अरिष्ट कमी घातुक आहे हे कशावरून !

पुन्हा मुलीच देवाला वहातात असे नाही तर मुलगेही वहातात. खंडोबाचा वाघ्या, अंबाबाईचा आराध्या, ध्यामव्वाचा पोतराज आणि यल्लमाचा जोग्या, ह्या सर्वांना लग्न करून इतरांप्रमाणे घरगुती पेशाने रहाण्याची सक्त मनाई असल्याने त्यांचे जीवित कमी अधिक प्रमाणाने बदफैली असते ह्यात नवल काय ? मात्र बायकांइतकी त्यांची संख्या मोठी नसते आणि त्यांच्या वागणुकीचा हलगर्जीपणाही बायकांच्या इतका नजरेत भरण्यासारखा नसतो. धड पुरुष नव्हे, धड बायको नव्हे अशा काही नपुंसक माणसांचा एक तिसरा वर्ग आहे. ह्या दुर्दैवी माणसांमध्ये अनीतीपेक्षा असभ्यतेचाच प्रकार जास्ती आढळतो आणि ते सहजच कुंटणपणाचे व इतर लांच्छनास्पद निंद्य धंदे करीत असतात, आणि त्यांना कित्येक सृष्टिनियमाविरुद्ध संवयीही लागलेल्या असतात. त्यांना काही दुष्ट हेतूने अशा स्थितीत टाकलेले असते की, ते जन्मतःच तसे असतात की नाही, हे सांगण्यास येथे अवकाश नाही. परंतु अंबाबाई, यल्लमा वगैरे देवींच्या देवळांशी त्यांचा कोणत्या तरी रीतीने संबंध जडलेला असतो. अशांची बरीच संख्या पुणे येथील ससून हॉस्पिटलजवळील बोलाईच्या देवळाभोवती नाचताना आणि टेहळताना दिसते. ह्यांना नपुंसकत्व कसे प्राप्त झाले आणि त्यांची अशी अवनीती कशी झाली ह्याविषयी शोध करण्यापलीकडे ह्यांच्या बाबतीत काही करता येईल, असे वाटत नाही, पण त्यांना व्यक्तिशः विशेष काही मदत करता आली नाही तरी त्या दुर्दैवी माणसांना सृष्टिदेवीने जो आधीच शाप दिला आहे त्याचे बीभत्स धिंडवडे आज समाजापुढे जे राजरोस चालू आहेत ते तरी कायद्याने आणि लोकमताने सहज बंद करण्यासारखे असताना ह्यांतील एकाद्या रीतीने का प्रयत्न होत नाही हे कळत नाही. ह्या बेकायदेशीर अनीतिपर आणि सृष्टिविरुद्ध देवळांतील प्रकारांचा केवढा मोठा व्याप आणि त्यांचे स्वरूप कसे अनिवार्य आहे हे ध्यानात आणून हल्लीच्या सुधारलेल्या काळीही शिक्षण आणि कायदा ह्यांना न जुमानता हे अरिष्ट कसे चालू आहे हे पाहिले असता कोणाही शुद्ध अंतःकरणाच्या न्यायी मनुष्याला ह्याची सक्त बंदी एकदम तीव्र उपायानेच झाली पाहिजे असे वाटल्याशिवाय रहाणार नाही. ह्या बाबतीत विलंब, वादविवाद आणि मीमांसा ह्यांची मुळीच आवश्यकता नाही. इतकेच नव्हे तर ही सर्व केवळ अक्षम्य आहेत असे कळून येईल. अशा प्रकारे शेवटी हा आवश्यक प्रश्न कोणी आपल्या हाती तो कसा सोडवावा ह्या मुद्याला आपण येऊन पोहोचतो. हा घातुक प्रकार ज्या खालच्या जातीत आढळतो त्या ह्या भंडारी, कुणबी, धनगर, नाईक, कोळी, बेडर, डासर, कबलिगार, तळवार, महार, मांग, वगैरे. ह्या अडाणी जातींवर आधुनिक शिक्षणसंस्थांचा आणि आधुनिक सभ्यतेचा संस्कार होण्यासारखा नाही म्हणून ह्या बाबतीत राजसंस्था व धर्मसंस्था ह्यांच्याकडेच पहावे लागत आहे, पण दुर्दैवाने ह्या देशातील सत्त्वशील राजसत्ता आणि जिवंत (ख्रिस्ती) धर्मसंस्था ह्या दोन्हीही परकी आहेत. सरकाराने, बरोबर असो किंवा चुकीचे असो, आपले तटस्थपणाचे एक निराळेच धोरण ठेवल्यामुळे आणि ख्रिस्तीधर्माने आपल्या उलट आपल्या चमत्कारिक मिशनरी पद्धतीमुळे लोकांमध्ये दुराग्रह आणि अविश्वास ह्यांचा एक अवाढव्य ढीग साचू दिल्यामुळे ह्या सामाजिक सुधारणेच्या बाबतीत राजसत्ता आणि धर्मसंघ ह्या दोन्हीही शक्ती पंगू झाल्या आहेत. उलटपक्षी, एतद्देशीय धर्मसंस्था आणि लोकमत ह्यांचे तर ह्या बाबतीत नावच घ्यावयास नको, इतकी त्यांची ढिलाई आहे.

ह्या बाबतीत उपाय करावयाचे ते दोन प्रकारचे. एक प्रतिबंधक व दुसरा उपशामक. पहिल्या संबंधाने इंडियन पिनल कोडचे ३७२ व ३७३ ही कलमे करून सरकाराने आपले कर्तव्य बजाविले आहे. ह्यापुढे त्या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करून आणि ज्यांना देवास वाहण्यात आले आहे त्यांची सोडवणूक करण्याची कामगिरी सरकाराला वाजवीपेक्षा जास्त अंगावर घेता येत नाही व ती त्यांनी घेऊही नये. सरकाराने केलेल्या कायद्याचा फायदा घेण्यासाठीच नव्हे तर त्याच्या पुढील कामगिरी बजावण्यासाठी ह्या बाबतीत एकाद्या खासगी, परोपकारी मंडळीनेच संघटित स्वरूपाने पुढे आले पाहिजे. ही खासगी संस्था एकाद्या विशिष्ट पंथाची अथवा धर्मसंघाची असू नये. तर हल्लीच्या हिंदुस्थानातील मिश्र लोकसमाजाच्या निरनिराळ्या घटकावयवाचे प्रतिनिधी ह्या मंडळीमध्ये असले पाहिजेत. परंतु अशा घाटाची मंडळी मुंबईमध्ये आधीच होऊन चुकली आहे. म्हणून ह्या बाबतीत वायफळ तर्क वितर्क न लढविता किंवा भाविक सदिच्छा प्रकट न करता मी ह्या मंडळीच्या सेक्रेटरींनी काढलेले जाहीर पत्र खाली जसेच्या तसेच देत आहे. सरकार, मिशनरी, सुधारक, परोपकारी आणि नीतिशास्त्रवेत्ते ह्या सर्वांनीच ह्या मंडळीचे मनःपूर्वक स्वागत करून आपापल्या परीने शक्य तितकी मदत करावयास पाहिजे.

पश्चिम हिंदुस्थानातील मुलांचे रक्षण करणारी संस्था   
संस्थेचे हेतू

(अ) मुलांची नीती बिघडविण्याचे होत असलेले प्रयत्न व ह्यांच्या बाबतीत खासगी रीतीने होणारे अन्याय ह्यांचा प्रतिकार करणे;
(ब) त्यांच्या संरक्षणार्थ कायद्याची अंमलबजावणी होईल अशी व्यवस्था करणे व इष्ट वाटल्यास अशा कायद्याची दुरुस्ती करून घेणे;
(क) वरील हेतू सफळ होण्याकरिता कामगार नेमणे;
(ड) वरील हेतू साधण्याकरिता दुस-या सर्व कायदेशीर गोष्टी करणे;
(ई) व्याख्याने, हस्तपत्रके वगैरेंसारख्या उपायांनी मुलांच्या शिक्षणाविषयीच्या व त्यांना योग्य वळण लावण्याविषयीच्या विचारांचा प्रसार करणे व न्यायास अनुसरून मुलांना वागविणे अशा प्रकारचे लोकमत तयार करणे.

सभासद
वार्षिक पाच रुपयांपेक्षा कमी नाही इतकी वर्गणी देणा-या कोणत्याही स्त्रीला अथवा पुरुषाला ह्या संस्थेचे सभासद होता येते. मात्र ह्या संस्थेच्या दोघा सभासदांनी त्याची किंवा तिची शिफारस करून मॅनेजिंग कमिटीमध्ये त्याची किंवा तिची निवड व्हावयास पाहिजे.

काम करण्याच्या रीती

पहिली — संस्थेच्या वरील (ई) कलमात सांगितलेल्या शिक्षणाच्या कामाकरिता जरूर वाटेल तेव्हा हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती किंवा पार्शी ह्यांना आपापल्या धर्माच्या लोकांपुढे व्याख्यान देण्यास सांगण्यात येईल, व्याख्याते इतर धर्माच्या श्रोतृवृंदापुढे आपल्या धर्माचे प्रवचन करणार नाहीत;

दुसरी — (अ) आणि (ब) ह्या कलमांत सांगितलेल्या कामाची अंमलबजावणी करताना कोणत्याही अज्ञान मुलास त्याच्या धर्माहून निराळ्या धर्माच्या मनुष्याच्या किंवा संस्थेच्या हाती दिले जाणार नाही;

 तिसरी — एकाद्या अज्ञान मुलाच्या मार्फत ही संस्था जेव्हा त्याच्या फिर्यादीचे किंवा बचावाचे काम हाती घेईल तेव्हा ते मूल त्या धर्माहून निराळ्या धर्माच्या, संस्थेच्या प्रतिनिधीकडे असणार नाही. पंढरपूर, धुळे, अहमदाबाद येथील व लेडी नॉर्थकूट ह्या अनाथ बालकाश्रमांनी संस्थेच्या ताब्यात असलेल्या मुलांना आश्रमात घेण्याचे कबूल केले आहे;

चवथी — संस्थेच्या सर्व कामगारांना अशी सक्त ताकीद आहे की, त्यांनी आपला धर्म, अज्ञान मुलांच्या धर्माहून निराळा असेल, तर त्यांना त्याचा उपदेश करू नये.

कार्यकारी मंडळ
मुंबईचे बिशप—अध्यक्ष.
ऑनरेबल सर नारायण चंदावरकर, ऑनरेबल मि. जी.के. पारख; डॉ. मॅकिकन, सर भालचंद्र कृष्ण—उपाध्यक्ष.

एच. आर. एच. वुइलकिनसन, मुंबई स्कॉटिश हायस्कूलचे प्रिन्सिपॉल, वि. रा. शिंदे, एलफिन्स्टन रोड, मुंबई; बी.एन. भाजेकर, आंग्र्याची वाडी, गिरगाव—सेक्रेटरी.

मार्सेय शहर.

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड.
ता. ५ ऑक्टोबर रोजीं सकाळीं ६ वाजतां मार्सेय जवळची टेंकडी दिसूं लागली.  आगबोट बंदरावर पोंचल्यावर कांहीं वेळानें न्याहारी आटपून आम्हीं 'पर्शिया' चा निरोप घेतला आणि ९॥ वाजतां युरोपच्या किनार्‍यावर पाय ठेविला.  ज्यांच्या मार्फत आम्हीं तिकिट काढिलें होतें, त्या कुक कंपनीचे दुभाषे आमची वाट पाहत बंदरावर उभे होतेच.  त्यांपैकीं एकानें आमचें सर्वही सामान आपल्या ताब्यांत घेतलें.  हिंदुस्थानचे आम्ही पांच विद्यार्थी आणि एक व्यापारी एकत्र हातों व लंडनपर्यंत मिळूनच गेलों.  आम्हां सर्वांला लंडनला लवकरच जावयाचें होतें म्हणून आम्हांस मार्सेय येथें १२ च तास रहावयास सांपडलें.  पण तितक्याच वेळांत जेवण वगैरे लवकर आटोपून मार्सेयचा पहावेल तितका भाग पाहिला.  आमच्या व्यापारी पारशी सोबत्यांस फ्रेंच भाषेंत थोडीशी जीभ हालवितां येत होती, त्याचा आम्हांस अतोनात फायदा झाला.  त्याच्याशिवाय आम्ही सर्व कान असलेले बहिरे आणि तोंड असलेले मुके झालों होतों.  वरील दुभाष्यानें मोठ्या आदबीनें आमची सर्व सोय करून 'हॉटेल डी जि नीव्ही' नामक खाणावळीच्या एजंटाशीं आमची गांठ घालून दिली.  दोनप्रहरच्या फराळास बराच अवकाश होता.  म्हणून आम्ही खाणावळींत विनाकारण खोलीचें भाडें भरीत न बसतां शहर पाहण्यास बाहेर पडलों.  मार्सेय हें फ्रान्स देशांतील दुसर्‍या प्रतीचें शहर व पहिल्या प्रतीचें मोठें महत्त्वाचें बंदर आहे.  आम्ही ज्या धक्यावर उतरलों, तो म्हणण्यासारखा सुंदर नव्हता व स्वच्छही नव्हता.  फ्रेंच लोकांच्या नखर्‍याविषयीं व छानीविषयीं माझी जी कल्पना होती, तिच्यामुळें माझी सकृद्दर्शनीं थोडी निराशा झाली.  पण जसजसा मी शहरांत शिरूं लागलों, तसतशी ही निराशा कमी होऊं लागली आणि कांहीं भागांतील रस्त्यांची शोभा व दुकानांचा थाट पाहून तर ती अजीबात नाहींशी झाली. आणि मुंबईचे उत्तम रस्तेही ग्राम्य वाटूं लागले.  पण स्वच्छतेच्या मानानें पाहिल्यास मुंबईला तिच्या कांहीं गल्ल्यांची पावसाळ्यांतील मासलेवाईक स्थितीची आठवण झाल्याबरोबर हीदेखील तुलना करूं नये असें वाटलें.  रस्ते बहुतेक फरसबंदीचे आहेत.  कांहीं ठिकाणीं अगदीं एका नमुन्याच्या घरांची रांग लागते.  विजेच्या ट्रॅमस्, घोड्यांच्या ट्रॅमस्, ऑम्नीबसेस आणि घोड्यांच्या व गाढवांच्या लहानमोठ्या गाड्या वगैरेंचा रस्त्यांतून  एकच घोळका चाललेला असतो.  अशा रस्त्यांतून आम्ही चाललों असतां रस्त्यांतील निदान अर्ध्या तरी लोकांचे डोळे आमच्याकडे लागले.  कां ?  तर मीं डोक्यावर आपला गुलाबी फेटाच घातला होता म्हणून.  एके ठिकाणीं गाडी ठरविण्यास आम्ही एकदोन मिनिटें उभे राहिलों, तर आमचेमागें लहान मोठ्या स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी जमली !  माझ्या एका डोक्याशिवाय आम्ही सहाहीजण जरी नखशिखान्त साहेब बनलों होतों, तरी हा प्रकार घडूं लागला.  जर आम्हीं सर्व आमचे सगळे निरनिराळे देशी पेहराव करून बाहेर पडलों असतों, तर रस्त्यांत काय अनर्थ घडता कोण जाणे.  तरी पण माझ्या एका फेट्यामुळें कांहीं कमी चळवळ उडाली नाहीं.  बायका आपल्या लहान मुलांस कडेवर किंवा खांद्यावर घेऊन आम्हांकडे बोट दाखवूं लागल्या, तरुण मुली घरांत पळत जाऊन इतरांस बाहेर बोलावून आम्हांस पाहत उभ्या राहत.  ह्या त्रासामुळें माझे सोबती थोडेसे कुरकुरूं लागले व मलाही अडचण वाटूं लागली.  आगबोटीवरदेखील ह्यासंबंधीं बरीच चर्चा झाली.  मार्सेय बंदरावर बोटींवरून उतरतांना, आमच्या बरोबर येणार्‍या एका सिव्हिलियनानें मजजवळ येऊन मोठ्या आस्थेनें विचारलें कीं, कायहो, हें तुमच्या डोक्यावरचें तुम्ही लंडनपर्यंत कायम ठेवणार कीं काय ?  लंडनचीं मुलें वात्रट आहेत, तीं तुम्हांस त्रास देतील.  माझ्या पोशाखाची तो विशेष कळकळ दाखवूं लागला, हें पाहून मीं त्यास विचारलें कीं, विलायतेस पोलीसची व्यवस्था चांगली आहेना !  ह्यानंतर विशेष बोलणें झालें नाहीं !  फ्रेंच लोक सर्वांपेक्षा अधिक उल्हासी व रंगेल आहेत; शहरांतील पुष्कळ लोक घरीं जेवणाची दगदग न करितां खाणावळींतच जेवतात, वगैरे गोष्टी मीं मागें एका प्रवासवर्णनांत वाचल्या होत्या.  त्यांपैकीं एक प्रकार असा आढळून आला कीं, मुंबईंतल्या इराण्यांच्या दुकानाप्रमाणें येथें खाण्यापिण्याचीं आरामस्थानें गल्लोगल्ली पुष्कळ आहेत.  दुकानासमोर रस्त्याच्या बाजूनें मोठें उघडें पटांगण असतें.  त्यांत शेंकडों खुर्च्या व टेबलें मांडलेलीं असतात.  येथें जेवणारांची गर्दी जमलेली असते.  हीं ठिकाणें स्वच्छ, सुंदर व भपकेदार असतात.  रस्त्यांतील गर्दीकडे पाहत व चकाट्या पिटीत, हे लोक उपहार करीत असतात.  दुसरा एक चैनीचा प्रकार असा आढळला कीं, कांहीं ठिकाणीं रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उंच व दाट झाडें लाविलीं आहेत.  हीं झाडें वर एकांत एक इतकीं मिसळून गेलीं आहेत कीं, भर दोनप्रहरीं देखील ह्या रुंद रस्त्यांत गर्द छाया असते.  अशा ठिकाणांस येथें बुलवर्ड असें म्हणतात.  जागजागीं विश्रांति घेण्यास बाकें ठेविलीं आहेत.  ह्या रस्त्यांतून गाड्याघोडीं जात नाहींत.  त्यांच्याकरितां दोन्ही बाजूनें वाटा करून दिलेल्या आहेत.  मधून रिकामटेकडे हिंडत असतात किंवा बसलेले असतात.

आम्ही 'नॉटर डेम् ड ला गार्ड' नांवाचें देऊळ पाहून परत खाणावळींत जेवणास गेलों व जेवण आटपल्यावर लगेच पॅलेस डिला शांप नांवाचा महाल पाहावयास गेलों.  हा महाल एका लहानशा टेंकडीच्या बाजूवर बांधला आहे.  त्याचे पहिले दोन मजले टेकडींतच कोरले आहेत व बाकीचे मजले त्यावर उभारले आहेत.  ही एकंदर इमारत अर्धवर्तुळाकार आहे.  हिच्यापुढें रस्त्यापर्यंत सारखें उतरतें पटांगण विस्तीर्ण पसरलें आहे.  त्यावर रसरसीत गवताचे आणि नानाविध रंगाच्या कोमल वनस्पतींचे गालीचे अंथरले आहेत.  दोहों बाजूंच्या गालीच्यांची शोभा पाहत पाहत आम्ही चढण चढून वर गेलों.  तों एका बाजूस पोष्टाच्या पेटीसारखी एक पेटी ठेविलेली दिसली.  आमच्यांतील एकानें तिच्या एका फटींतून आंत एक पैसा टाकिल्याबरोबर दुसर्‍या एका फटींतून मार्सेयच्या एका सुंदर इमारतीचा फोटो बाहेर पडला. ह्या इमारतीचा समोरचा तळमजला टेंकडीच्या खडकांत कोरून काढला असून, ह्या ठिकाणीं कोरींव लेणें फार पाहण्यासारखें आहे.  येथें अर्धवट उजेड व अर्धवट अंधार आहे.  पोखरून काढलेल्या भरभक्कम खांबाभोंवतीं आणि पुतळ्यांच्या आजूबाजूला खडकांतून झिरपणार्‍या झर्‍याचें पाणी खेळत आहे.  शांत समयीं हें एकांतस्थळ पाहून असें वाटतें कीं, निसर्ग आणि मानवी कला ह्या जोडप्याचें हें जणूं क्रीडास्थानच असावें.  महालाच्या ह्या मधल्या भागाच्या दोन्ही बाजूंस अर्ध वर्तुलाकार दोन दालनें आहेत.  एका दालनांत अनेक प्रकारच्या जनावरांचीं व पक्षांचीं मृत शरीरें व इतर पदार्थ ह्यांचा मोठा संग्रह व्यवस्थेनें लावून ठेविला आहे.  आणि दुसर्‍या दालनांत खालच्या मजल्यांत पुतळे व वरच्या मजल्यांत चित्रें ह्यांचा संग्रह ठेविला आहे.  ह्यांपैकीं बहुतेक चित्रें आणि मूर्ति नग्न होत्या, त्यांत विशेषेंकरून कांहीं सुंदर तरुण स्त्रियांचीं चित्रें तर केवळ नग्न आणि नैसर्गिक स्थितींत इतकीं हुबेहूब दाखविलीं होतीं कीं, आम्हां पौरस्त्यांस तिकडे पाहिल्याबरोबर पराकाष्ठेची शरम वाटून, चित्रांतील सुंदरीचा जणूं अपमान केल्याप्रमाणें खेद वाटे.  तसेंच ह्यावरून फ्रेंच लोकांच्या सौंदर्याभिरुचीचाही मासला कळतो.  हीं चित्रें सुप्रसिद्ध व सुंसंस्कृत चितार्‍यांच्या मनांतून व हातांतून उतरलीं असल्यामुळें एकावर चित्त गुंतलें, तें तेथेंच गुरफटून राही.  इतक्यांत सहज दुसरीकडे नजर गेल्याबरोबर तिकडेच लय लागे.  हा देखावा पाहून आम्हांस असें वाटूं लागलें कीं, दैवी सौंदर्य आणि मानवी चातुर्य ह्या दोन्हींची आम्हांस ह्यापूर्वी नीटशी कल्पनादेखील नव्हती.  काव्य, इतिहास, नाटक, पुराण, दंतकथा, प्रवासवर्णन, भूगोल, खगोल आणि दुसर्‍या अनेक शब्दसृष्टींचें प्रतिबिंब ह्या चित्तवेधक चित्रसृष्टींत परावृत्त झालें होतें.  हाच मासला पुतळ्यांचाही.  असो, अशा प्रकारचा हा संग्रह अफाट असून आम्हांला वेळ तर फारच थोडा होता.  आणि शहरांत अशीं ठिकाणें आणखी किती होतीं कोण जाणे.  अशा स्थितींत आमच्या मनाची किती ओढाताण झाली हें सांगतांच येत नाहीं.

मार्सेयमध्यें व पारीसमध्येंही एक चमत्कार दिसला.  तो हा कीं, ४।५ ठिकाणीं बायकांच्या ओंठांवर मिशा दिसल्या !  एका वृद्ध बाईला तर अगदीं खास वस्तर्‍याची गरज लागत होती, असें दिसलें; कारण, तिच्या हनुवटीवर, गालांवर आणि ओठांवर करड्या रंगाचे राठ खुंट वाढले होते.  एकदोन युवतींच्या ओंठावर कोवळ्या व निळसर केसांच्या दाट पण आंखूड मिशा पाहिल्या.  ह्या नटव्या फ्रेंच बायकांनीं कसलीं तरी तेलें लावून आपले केस कृत्रिम रीतीनें वाढविले असल्यास न कळे ! जेवण वगैरे आटपून रात्रीं ८ वाजतां आम्ही स्टेशनावर गेलों.  तेथें कुक कंपनीचा दुभाषा आमचें सर्व जड सामान घेऊन आमची वाट पाहत हजर होताच.  आमच्यासाठीं एक रिझर्व्हड २ र्‍या वर्गाचें कंपार्टमेंट घेऊन त्यांत आमची सर्व सोय त्यानें लावून दिली; आणि आम्ही ८।४० ला पारीसला निघालों.  थंडी फार पडली असल्यानें आम्ही दारें पक्कीं बंद करून जवळ असेल तितका गरम कपडा अंगावर घेऊन स्वस्थ गुरफटून निजलों.  तों सकाळीं ६ वाजतां डीजॉन स्टेशनावर जागे झालों.  गाडीचा वेग दर तासास ५०-६० मैलपर्यंत होता.  डब्यांची रुंदी किंचित् जी. आय. पी. पेक्षां ज्यास्त असते.  प्रत्येक डब्यांत लांबीच्या बाजूनें सुमारें ३ फूट रुंदीचा भाग ग्यालरीसारखा खुला असतो.  ह्या ग्यालरींतून गाडीच्या एका टोंकापासून दुसर्‍या टोंकापर्यंत गाडी चालू असतांनादेखील जातां येतें.  आगबोट बंदरावर पोंहोंचल्याबरोबर जरुरीच्या उतारूंस ताबडतोब नेण्यास पी. अँड. ओ. स्पेशल, तयार असते, ती मार्सेयहून जी लगेंच निघते ती कॅलेवरच थांबते.  त्या गाडींत एक भोजनाचा स्वतंत्र हॉल आणि निजण्याच्याही खोल्या असतात.  डी जॉन स्टेशनापासून तों पारीसपर्यंत, वाटेंत शेतें, कालवे, दर्‍या, बोगदे, गांवे इ. - चा सुंदर देखावा गाडींतून दिसला. पाऊस एकसारखा सपाटून पडत होता.  फ्रेंच लोकांची सौंदर्याभिरुचि त्यांच्या शेतांतूनही दृष्टीस पडते.  ह्यांचीं शेतें म्हणजे केवळ बागच !  कालव्याच्या कांठीं झाडें लागलीं होतीं, तीं जणूं कवाइतीलाच उभीं आहेत असें वाटे.  जागोजाग खेडीं लागत, तीं खेडीं, नव्हत, चित्रेंच तीं !  फ्रान्सचीं शेतें सकाळच्या वेळीं गाडींतून धांवत असतांना प्रथमच पाहून एकाद्या नवख्यास, इतर ठिकाणीं राजा होण्यापेक्षां, फ्रान्समध्यें शेतकरी होणें बरें, असें वाटल्यास त्यांत नवल काय ?

मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ति

२
(प्रार्थनामंदिर तारीख ६-३-१९१०)   
काय ते विरक्ति न कळे आम्हां | जाणे एका नामा देवाजीच्या||
नाचेन मी सुखे संतांचिये मेळी | दिंडी टाळ घोळी आनंदीया ||
कासया उदास होऊ देहावरी | अमृतसागरी बुडोनिया ||
कासया एकांत सेवू तया वना | आनंद या जनामाजी असे |
तुका म्हणे मज आहे हा भरंवसा | विश्वेश सरसा चालतसे ||

सभोवतालच्या मनुष्यांविषयी आदरबुद्धी राखिली, म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा आपण कशी संपादन करतो हे मागे सांगितले. आता मनुष्यावर प्रीती केली म्हणजे ईश्वरविषयक भक्ती कशी वाढते हे आपण पाहू.

एकाचा दुस-याशी जो स्नेहसंबंध जुळतो तो केवळ कर्तव्यबुद्धीचा किंवा शासनाच्या किंवा कसल्याही दाबामुळे ओढूनताणून आणलेला नसतो, तर तो एक मनाचा स्वाभाविक ओढा असतो. स्वार्थत्याग करून जगाच्या कल्याणाकरिता स्वत:ची आहुती देणे ह्यापेक्षा खाजगी स्नेहसंबंध वाढविणे हा ईश्वरभक्तीचा सुलभ उपाय आहे. ह्या स्नेहसंबंधामुळेच एक व्यक्ती दुस-या व्यक्तीशी गुंतलेली दिसते. ह्यामुळे जगामध्ये आनंद दृष्टीस पडतो. ह्यांच्या अभावी सर्वत्र अंध:कार दिसेल. ह्याकरिता हा संबंध वाढविण्याची योग्य खबरदारी घेणे हे एक आपले परमार्थाचे दुसरे प्रापंचिक साधन आहे.

ज्या दोन व्यक्तींमध्ये निष्काम स्नेहाचा पवित्र संबंध जडतो, त्या दोघांमध्ये सारखेच गुण असतात असे नाही. दोघांमध्ये भिन्न भिन्न सुंदर गुण असून एकाचे गुण आकर्षण करण्याची चुंबकशक्ती दुस-यामध्ये असते. किंबहुना एकमेकांच्या काही क्षम्य उणेपणामुळेही ही परस्पर चुंबकता जोरावते. ‘व्यतिषजति पदार्थानांतर: कोपिSहेतु:’ ह्या न्यायाने केव्हा केव्हा ह्या आकर्षणास विषय झालेला असा जो काही गुण असतो, तो दोघांसही न कळता, गुणांची छाया-प्रतिछाया, तन्मूलक भावनांचा आघात-प्रत्याघात परस्परांमध्ये होऊन त्या दोघांचेही दोष कमी कमी होत जाऊन गुण वाढत जातात, आणि भिन्न स्वभावाला हळूहळू एकात्मकता येऊ लागते. दोघांच्या भिन्न आदर्शाचे प्रतिबिंब परस्परांच्या मनांमध्ये पडून दोन निरनिराळे स्वभाव नसून ते जणू काय एकच आहे असे होते. योद्धा आणि कवी, मुत्सद्दी आणि तत्त्ववेत्ता, कर्ता पुरूष आणि लेखक, अशा भिन्न गुणांच्या मनुष्यांमध्ये स्नेह जुळून दोघांनाही स्वत:च्या आदर्शाची परिपूर्ती करावयास वाव मिळतो. ह्याप्रमाणे स्नेहाच्या ह्या दोन क्रिया आहेत. एक उणीव भरून काढणे आणि दुसरी आदर्श पूर्ण करणे.

रस्त्यात खेळत असताना लंगोटीयार एक, शाळेतला सोबती दुसरा, तरूणपणी तिसरा आणि वृद्धापकाळी निराला असे स्नेहसंबंध केव्हा केव्हा बदलत जातात, ह्यावरून त्याचे वर दर्शविलेले मूळ स्वरूप अस्थिर आणि खोटे आहे असे होत नाही. रस्त्यातल्यापेक्षा शाळेतला सोबती आपल्या मनाशी अधिक तादात्म्य पावतो. शाळेत स्वत: आपल्या मनाची वाढ आणि भूक वाढल्यामुळे संसारात शिरल्यावर आपल्यास शाळेतल्याहून थोर सोबत्याची जरूरी भासते. आणि वृद्धपणी ह्याहूनही निराळ्या सोबत्याची उणीव भासते. ह्यावरून स्नेहतत्त्वाचा अस्थिरपणा सिद्ध होत नसून ते विकासमान तत्त्व आहे हे दिसून येते. आपल्या स्वभावाची जसजशी वाढ होते तसतसे आपण निरनिराळे मित्र करीत असतो आणि उलटपक्षी जसजसे आम्ही निरनिराळे मित्र करू तसतशी आपली वाढ होत जाते. म्हणजे एका पायरीवरून दुसरीवर, दुसरीवरून तिसरीवर अशी आपण आत्मिक चढण चढत असतो. म्हणून ह्या अपूर्व संसारामध्ये स्नेहसंबंध ही पवित्र बाब आहे आणि तिचे अन्तिम पर्यवसान ईश्वरभक्तीमध्ये होणार असल्यामुळे ती एक आध्यात्मिक शिडीच होय.

प्रसिद्ध इंग्लिश राजकवी टेनिसन ह्याने “In memoriam” ह्या आपल्या काव्यात मित्रवियोगाच्या आपल्या दु:सह वेदनांचे जे काळीज करपून सोडणारे आणि डोळ्याला अंधेरी आणणारे वर्णन केले आहे ते वाचून वाचकांच्या मनाला प्रथम त्याच्या सत्यत्वाबद्दल किंचित शंका येऊ लागते. मरण हे सर्वांनाच येणार म्हणून मातेला कितीही सांगितले तरी ती आपल्या मुलाच्या मरणामुळे आक्रोश करणारच. पत्नी पतीकरिता, बंधू बंधूकरिता शोक करील, पण मित्र मित्राकरिता इतका शोक करील हे खरे वाटत नाही. हे कवीचे लाघव असेल असे वाटते. जात्या भ्याड कवी वीररसात्मक काव्य लिहिताना कल्पनेने ज्याप्रमाणे शौर्याची भावना आपणांमध्ये आणतो, त्याप्रमाणे टेनिसनने कवित्वाच्या जोरावर हे काल्पनिक वर्णन केले असावे असे प्रथम वाटते, पण अधिक विचार केल्यावर आणि त्या काव्याचे पुन:पुन्हा परिशीलन केल्यावर, त्या कवीचे नव्हे, तर साधारण मानवी कल्पनाशक्तीच्या संबंधानेही आपण फार कोती समजूत करून घेतली असे दिसून येईल. टेनिसनला खरोखरच दु:सह वेदना झाल्या, ह्याचे कारण त्याचे आपल्या मित्रासी तसेच अभेद्य तादात्म्य झाले होते आणि त्याचा भंग झाल्यामुळे त्याला वेदना होत होत्या. अशा तादात्म्याचा ज्यांना अनुभव नाही आणि कल्पनाही नाही त्यांना ते वर्णन नुसते कवीचे लाघव वाटणे साहजिक आहे. मित्राच्या जिवास त्याचा जीव लागून गेल्यामुळे व त्याशी एकाकार झाल्यामुळे त्याच्या वियोगामुळे आपले अर्धे अंग कापून गेल्याप्रमाणे त्यास वेदना होऊन लागल्या. परंतु ह्या वेदनांमुळे त्याला नुसता प्राकृत माणसाप्रमाणे शोकच होऊन राहिला असे नाही. शोक तर झालाच, पण क्रमाक्रमाने त्यामध्ये अति गंभीर विचारजागृती होऊन हळूहळू थोर तत्त्वांचे दर्शन होऊ लागले. विरह, उद्वेग, निराशा, विचार, शंका, आशा, श्रद्धा आणि शेवटी आनंद अशी त्याच्यामध्ये आध्यात्मिक अनुभवाची परंपरा उत्पन्न झाली. ज्या मित्रावर आपण जीव की प्राण असे प्रेम केले तोच जणू आपल्या आकुंचित कुडीतून उडून जाऊन दशदिशा फाकला, जो आपल्या प्रेमाचा साठा आणि विनाशी विषय होता तो आता सर्वत्र पसरलेला आणि अनंत काळ टिकणारा असा झाला. अज्ञेयवादी टेनिसन स्नेहसंबंधाच्या प्रभावामुळे किंबहुना त्याच्या विरहामुळे श्रद्धाळू आणि आनंदवादी भक्त बनला.

असा आमच्या ह्या प्रापंचिक स्नेहाचा महिमा आहे. तो संबंध आम्ही निष्ठेने जर चालवू तर तो फलदायी होईल. कोणी म्हणेल स्नेहसंबंध ही स्वाभाविक बाब आहे तर तेथे निष्ठेची काय जरूर आहे? तो आपोआप वाढत जाईल. पण मनुष्यस्वभावामध्ये जशी संघातक तशीच विघातकही बीजे आहेत. आणि कित्येक वेळां जसे आंतरिक दोषामुळे तसेच बाह्य उपाधीमुळेही आपल्या स्नेहाच्या प्रवाहात विक्षेप घडतो. अशा वेळी आपल्या अंगी निष्ठेचे बळ असल्यास ह्या विघ्नातून आपण पार पडू. प्रवाहातून पोहत जाणारा मनुष्य भोव-यात सापडला असता त्याच्या अंगी कस असल्यास तो त्या भोव-यास फोडून बाहेर पडतो. एरवी त्यातच बुडून जातो. त्याप्रमाणे आपण स्नेहसंबंध निष्ठेने चालविण्याचे बळ अंगी संपादिले तर अंतर्बाह्य कारणामुळे वेळोवेळी घडणा-या ह्या आमच्या स्नेहसंबंधाच्या प्रवाहातील विक्षेपाच्या भोव-यामधून आम्ही पार पडू. एरवी तो संबंध मध्येच तुटून गेल्याची अनेक उदाहरणे आढळतात. अशा रीतीने आमरण स्नेहसुख भोगून जर मित्रवियोग घडला तर तो वियोगच, टेनिसनला अनुभव आल्याप्रमाणे, ईश्वरी दर्शनास कारण होईल. ह्याप्रमाणे परलोकाप्रत गेलेल्या आपल्या मित्रावर निष्कामवृत्तीने केलेल्या प्रेमामध्ये अविनाशी अनंत भक्तीची बीजे कशी रूजलेली असतात हे कळेल. सुरवंटाचा जसा पतंग बनून तो सर्वस्थळी आनंदाने वावरू लागतो, तसा आमचा विदेही मित्र सर्वव्यापी झाला असता आमचे मनही त्याच्या मागोमाग भ्रमण करीत सर्वव्यापी होते. ह्यापरती ईश्वरभक्ती वेगळी कोठे राहील? अशा मित्राचा वियोग झाला तर काही वेळ आपण गडबडून जाऊ, पण पुढे विवेकासहित आपल्यामध्ये वैराग्याचे बळ उत्पन्न होऊन, सर्व जग माझा मित्र आहे असे आपणांस वाटेल. आपली आकुंचित वृत्ती नष्ट होईल, आपणांस आनंदीआनंद होईल. असे सुखवादी झालो म्हणजे आपण ईश्वरभक्त झालो असे म्हणावयाचे. मग तुकारामाने सांगितल्याप्रमाणे-

ऐसे भाग्य कई लाहाता होईन | अवघे देखे जन ब्रह्मरूप ||
मग तया सुखा अंत नाही पार | आनंदे सागर हेलावती ||

हा अनुभव आपणांस येईल. पण त्यासाठी अगोदर आपण आपल्या भोवतालच्या मनुष्यामध्ये स्नेहसंबंधाचे वलय वाढवावे. मनुष्यावर प्रेम न करता मी ईश्वराचा भक्त आहे असे कोणालाही म्हणविता येणार नाही. ह्याकरिता राजाने प्रजेवर, पतीने पत्नीवर, धन्याने चाकरावर हाच स्नेहसंबंध प्रेम किंवा निष्ठा ठेवून वाढवावा, म्हणजे त्याचा लय ईश्वरभक्तीमध्ये होईल.

मानवी आदर आणि दैवि श्रद्धा

१.
(प्रार्थनामंदिर ता. २७-२-१९१०)

सेवा-भक्ति-भाव, नेणें मी पतित ||
-तुकाराम

परमेश्वरावर प्रथम भाव ठेवणे, त्यासच आपल्या प्रेमाचा विषय करणे, त्याची इच्छा तीच आपली इच्छा अशा भावनेने त्याची सेवा करणे आणि ह्या तीन साधनांच्याद्वारे प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित ह्या कर्मबंधनातून मुक्त होणे, ह्या परमार्थाच्या चार पाय-या आहेत. परंतु परमेश्वराचे स्वरूप म्हणजे अगदी अतर्क्य आणि अज्ञेय हा अनुभव लहानमोठ्या सर्वांसच येतो. “न कळे महिमा वेद मौनावले | जेथे पांगुळले मन पवन |” असे संत सांगतात. तर मुळी समजण्यासच कठीण, अशा परमेश्वरावर भाव कसा ठेवावयाचा,भक्ती आणि सेवा कशी करावयाची आणि मुक्त कसे व्हावयाचे? आम्ही प्रापंचिक माणसे, आमच्या अल्पशक्तीचा आणि वेळेचा बराच भाग आमच्या प्रापंचिक गोष्टीतच खर्च होणार. बाल्य, जरा, व्याधी इत्यादिकांमध्ये आमच्या आयुष्याचा बराच भाग निकामी होणार. अशा स्थितीत परमेश्वरासंबंधी भाव, भक्ती, सेवा ही प्रत्यक्षपणे आमच्या हातून कशी घडावी? तशी आमची इच्छा असूनही, घडणे जवळ जवळ अशक्य आहे. म्हणून आमच्या प्रापंचिक व्यवहारातच जर कोणी असा मार्ग दाखवून दिला, आणि आमच्यातील परस्पर व्यवहारांना कोणी असे वळण लावून दिले की, त्याचे पर्यवसान वरील भाव, भक्ती, सेवा ह्यांमध्ये साहजिकपणे होईल, तर मोठी चांगली गोष्ट होईल. एरवी परमेश्वराविषयी कितीही दर्शने स्थापिली, कितीही कंठरवाने उपदेश केला, तरी त्याचा तादृश्य फायदा होणार नाही. प्रापंचिक व्यवहार आणि त्यातील  अपूर्णता समूळ नाहीशी होऊन, केवळ वरील पारमार्थिक भावनांचे साम्राज्य चालेल हे संभवत नाही. व्यक्तीविषयक अपवाद सोडून दिले, आणि सर्व मनुष्यजातीचा समवायाने परमार्थ साधावयाचा असला तर तो ह्या आमच्या रोजच्या प्रापंचिक व्यवहारालाच हळूहळू योग्य वळण देऊन साधणार आहे. म्हणून आम्हांस परमार्थाची काही प्रापंचिक साधने कोणी सांगेल तर तोच खरा उपदेशक.

परमार्थाच्या उपदेशकास प्रापंचिकांनी जर वर सांगितल्याप्रमाणे आपली अडचण कळविली तर ती अगदी योग्य होईल. आणि ती ध्यानात ठेवून उपदेशकाने आपला सर्व रोख अवश्य वळवावयास पाहिजे ह्यात संशय नाही. म्हणून आम्ही प्रथम ईश्वरावर आमची श्रद्धा प्रत्यद्ध एकदम जरी जडली नाही, तरी पर्यायाने कशी जडेल हे पाहू. संसारात इष्टमित्र, सखेसोयरे, आश्रितजन आणि परकीय ह्यांच्यामध्ये परस्परांचा नित्य संबंध येतो. त्यात असे एक वर्तनाचे कोणते तत्त्व आहे की, जे पूर्णपणे आणि निश्चयाने सांभाळिले असता त्याचे पर्यवसान ईश्वरी श्रद्धेमध्ये होईल? एकदम सांगावयाचे म्हणजे आम्ही जर परस्परांशी आदरबुद्धीने वागू आणि त्यामध्ये कधीही चूक होऊ देणार नाही, तर शेवटी आमची ईश्वरावर आपोआपच श्रद्धा जडलेली आहे असे आपणांस आढळून येईल. रोजच्या व्यवहारात मनुष्यप्राण्याशी किंबहुना भूतमात्राशी आदराने वागल्याने अपरिमित, अप्रमेय ईश्वरावर श्रद्धा ती कशी बसेल ह्याविषयी शंका उत्पन्न होईल. पण आदराचे हे व्रत अखंड चालविल्यानेच वरील शंकेचे निरसन होणार आहे. एरवी शाब्दिक युक्तिवादाने ते होणार नाही.

मनुष्यमात्राशी आदरबुद्धीने वागावे ही त्यातल्यात्यात सुलभ गोष्ट आहे. दुस-याने आपला अपराध केला तर त्याला क्षमा करावी, दुस-यावर आपल्या स्वत:प्रमाणेच प्रेम करावे, ह्या गोष्टी कठीण भासतात, इतकेच नव्हे तर त्या अधिक महत्त्वाच्या वाटतात. पण पुष्कळ प्रसंगी क्षमेचा आणि प्रेमाचा प्रसंगच येत नसूनही आपण क्षमा आणि प्रेम करीत आहो असे आपल्यास मात्र वाटत असते. क्षमा करावयाच्या पूर्वी दुस-याने खरोखरीच आपला अपराध करावयास पाहिजे. पुष्कळ वेळां असे घडते की, दुस-याकडून अपराध झालेला नसतो तो आम्ही उगाच मानून घेऊन क्षमा करीत असतो. आणि यद्यपि खरोखर अपराध झाला असला, तरीक्षमा करण्याचा अधिकार आपणाकडे न घेता तो ईश्वराकडे सोपविणे अधिक श्रेयस्कर असते. काही झाले तरी क्षमेची भावना आपल्या मनात येत असता दुस-यांच्या दोषांच्या जाणिवेचा थोडाबहुत विटाळ आपल्या मनाला होतोच. आदरबुद्धीचा तसा प्रकार नाही. सर्व मनुष्यांस आपल्यासमान लेखणे हा आदरबुद्धीचा अर्थ आहे. दुस-याचे दोष दिसल्याबरोबर आपल्या दोषांचे स्मरण होणे, दुस-यांची पापे पाहिल्याबरोबर जणू काय ती आप-या हातून घडली, असे वाटून त्याविषयी अनुकंपा बाळगणे हे आदरबुद्धीचे लक्षण. दुस-याच्या शरीराला क्षत पडल्याबरोबर आपल्या मनाला दु:ख होते, तर दुस-याच्या मनाला क्षत पडल्याबरोबर आपल्या मनाला जास्त दु:ख व्हावयास पाहिजे. पण असे न होता, दुस-याच्या मनाचा उणेपणा अथवा अपराध नजरेस आल्याबरोबर आपण आपल्यामध्ये क्रोध आणि तिरस्कार ह्यास जागा देतो. ह्याचे कारण मनुष्यमात्रासंबंधी आपल्यामधील आदरबुद्धीचा अभाव हेच होय. ‘आत्मवत् सर्वभूतानि य: पश्यति स पश्याति|’ हे आदरबुद्धीचे योग्य प्रवचन आहे. आदरबुद्धी म्हणजे केवळ औपचारिक ओढून ताणून आणलेला दरबारी संभावितपणा नव्हे. मनुष्याचे मन-मग तो मनुष्य कसाही असो-ही एक आदरणीय वस्तू आहे, सुखदु:ख, पाप आणि पुण्य ह्या सर्व स्थितीत ह्या मानवी मनाशी अन्यायाने, बेपर्वाईने, निष्काळजीने कधीही वागता कामा नये, अशी आपल्या मनाला संवय लावावी. सर्व प्राणिमात्रांच्या जीवास धक्का न लागावा, म्हणून अहिंसेचे जे तत्त्व आम्ही आचरितो, ह्याच तत्त्वाचा अधिक परिणत विकास म्हणजे मानवी मनाशी आपल्यामध्ये आदराची उपजतबुद्धी राखणे हे होय.

एकाच कुटुंबामधील माणसे पुष्कळ मागे परस्पराशी भांडून रूसतात आणि अलग होतात. पण कौटुंबिक रक्तसंबंधामध्ये असे काही अपूर्व रसायन आहे की, त्यायोगे हा रूसवा-फुगवा लवकरच नाहीशी होऊन ती एकत्र होतात. परंतु परकीयाशी बेबनाव झाला तर आपल्यामध्ये वरील उपजत आदरबुद्धीचे रसायन नसल्यास हा तुटलेला संबंध पुन्हा जुळून येत नाही. पण ह्या आदराच्या भावनेत आम्ही नित्य वागू लागलो, तर संसारातील ब-याच कटकटीच्या प्रसंगी आपल्या मनाला जखमा होणार नाहीत; झाल्या तरी त्या लवकर भरून येतील आणि मनाची पुष्कळ मोडतोड आणि झीजही होणार नाही.

ही आदरबुद्धी खालील तीन प्रकारांनी पाळण्याचे व्रत धरिले पाहिजे; जसे आपले विचार आपल्यास प्यारे असतात तसेच आणि तितकेच दुस-यांचेही विचार त्याना प्यारे असतात तसेच आणि तितकेच दुस-यांचेही विचार त्याना प्यारे असतात ही गोष्ट अगदी उघड आहे. तथापि एकाद्या विषयावर आपण चर्चा करू लागलो, तर ही गोष्ट आपण पार विसरून जातो,  आणि चर्चा करणारे दोन्ही पक्ष आपले विचार आपल्यास प्रिय आहेत एवढ्याच समजुतीने बोलू लागतात. आपल्याला दुस-यास जे सांगावयाचे ते त्याला त्याचे विचार ‘प्रिय आहेत हे आपण जाणतो’ असे दाखवून नंतर सांगावे. प्रतिपक्षाला एकदा हा आमच्यातील आदरभाव समजला म्हणजे वादाची तीव्रता बरीच कमी होऊन जाते, नाही तर तो आमचा एक शब्दही ऐकणार नाही व जर ऐकू लागलाच तर त्याचा आमच्याविषयी गैरसमज होईल. प्रथमारंभीच आदराच्या ह्या नियमाची हेळसांड करून आपण वादविवाद करू लागल्यास वाद एका बाजूस राहून द्वंद्व माजते व प्रकरण हातघाईवर येते. ज्याची मते ज्याला त्याला प्रिय असतात, म्हणून कोणास कोणी काही सांगू नये असा ह्याचा अर्थ नव्हे. परंतु त्याला मान्य नसलेले असे काही आपण त्याला सांगावयाचे असते, म्हणून आपण त्याची तयारी करण्यासाठी त्याच्या मताविषयीचा आपला पूज्यभाव त्याच्या मनावर चांगला ठसविण्याची जरूरी आहे.

दुसरा प्रकार, दुस-याच्या मनोवृत्ती सांभाळणे हा होय. आपल्याप्रमाणेच दुस-यालाही वृत्ती आहेत, आणि दुस-याप्रमाणेच आपल्यामध्येही व्यंगे आहेत. दुस-याने जर आपल्याशी सांभाळून वागावे असे आपणांस वाटते तर आपणही दुस-याशी तसेच वागले पाहिजे. नाही तर बेपर्वाईने, बेगुमानपणाने, व्याख्यानाच्याद्वारे, वर्तमानपत्राच्याद्वारे किंवा अन्य त-हेने आम्ही आपला हलगर्जीपणा दाखविला तर त्याचा दुष्परिणाम दोघांनाही भोवतो. तिसरा प्रकार हा की, केवळ दुस-याचे दोषच सांभाळून न राहता दुस-याच्या गुणांचे आणि कृतीचे योग्य मंडन केले पाहिजे. एकाद्याच्या हातून काही कृत्य घडले व ते लोकांच्या कानी घातल्यापासून फायदा आहे अशी आपली खात्री झाली तर, त्याची प्रसिद्धी करणे आपले कर्तव्य आहे आणि तसेच दुस-याच्या आनंदाने आपण आनंदी होणे हे मोठेपणाचे लक्षण आहे.

ह्याप्रमाणे आम्ही जर मनुष्यमात्राशी आदराने वागू तर ह्याच प्रापंचिक आदरबुद्धीचा विकास ईश्वराच्या ठायी आमची श्रद्धा जडण्यामध्ये होईल. तुम्ही प्रेम करा, न करा, क्षमा बाळगा न बाळगा, पण हा आदरभाव कायम ठेविल्यास प्रेम आणि क्षमेचे श्रेय येईल. घडोघडी संबंध जडणा-या मनुष्याशी अनादराने वागून अदृश्य ईश्वरावर श्रद्धा ठेवणे कधीतरी आम्हांला संभवनीय होईल काय? पाया आणि तळमजला असल्याशिवाय वर भरभक्कम किल्ला आहे हे मानणे जसे वेडगळपणाचे होईल, तसे आदर नसताना मी श्रद्धावान होईन हे म्हणणेही वेडगळपणाचे आहे. ईश्वर मला तारो वा मारो, मी त्याचे पाय दृढ धरीन, त्याचे रूप कसेही असो त्याची वसती मजमध्ये आहे असे मी मानीन, पण शेजारच्या मनुष्याशी माझा आदरभाव आहे की नाही इकडे लक्ष देणार नाही हे म्हणणे चमत्कारिक दिसते. उलटपक्षी आपण ह्या प्रपंचामध्ये ह्या आदराचा सुलभ मार्ग चालून जाऊ, तर काही काळाने आपल्यामध्ये आपोआप ईश्वरी श्रद्धेचा साक्षात्कार होईल, म्हणूनच तुकाराम म्हणतात :

नको मज ताठा नको अभिमान |
तुजवांचुनि क्षीण होतो जीव ||१||

  1. मरण म्हणजे काय?
  2. मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना
  3. मनुष्यजन्माची सार्थकता
  4. मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ति
  • 94
  • 95
  • 96
  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
Page 99 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी