1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

परमार्थाची प्रापंचिक साधने

५

(प्रार्थनामंदिर ता. ३-४-१९१०)

येउनि नरदेहा झाकितील डोळे | बळेंचि अंधळे होती लोक ||
उजेडा सरशी न चलती वाट | पुढील बोभाट जाणोनिया ||
तुका म्हणे जाऊ सादवीत वाट | भेटे तरी भेटो कोणी तरी ||

मागे चार वेळां ईश्वरावरील श्रद्धा, भक्ती, त्याची उपासना आणि तद्वारा आपली मुक्ती ह्या चार परमार्थांची, अनुक्रमे मनुष्यमात्रासंबंधी आदरभाव, स्नेह, सेवा आणि मनाची प्रसन्नता ही चार प्रापंचिक साधने कशी आहेत, ह्याचा विचार केला. ह्याचा उद्देश प्रपंच आणि परमार्थ ह्यांची एकवाक्यता करणे हा होता. आता त्याच गोष्टीचा सामान्य विचार करू.

पुष्कळांना परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने करणे आवडत नाही. जुन्या लोकांना तर तो नास्तिकपणा वाटतो. आणि काही अहंमन्य लोकांना त्यात जडवाद दिसतो. तुकारामाच्या समकालीन साधूंचाही कल परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने करण्याच्या विरूद्ध असे. तुकारामाने मात्र काही अभंगांत परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने केला आहे. त्यापैकी वर लिहिलेला अभंग होय. त्याचा अर्थ ह्या जन्मामध्ये सर्व गोष्टी साधता येतात. प्रत्यक्ष प्रकाश ह्या नरदेहातच दिसतो. असा लाभ पुनरपि मिळणे शक्य नाही. पुष्कळ वळसे घेतल्यानंतर आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. आपण ह्या मार्गाने जात आहे हे लोकांना कळविण्याकरिता सादवीत म्हणजे आरोळ्या मारीत जाऊ. कोणी येवोत वा न येवोत. ‘संवसाराते तुझी आले हो आईका| तुटीचे ते नका केणे भरू||’ ह्याही अभंगात तुकाराम म्हणतात, ह्या संसाररूपी बाजारात खोटा जिन्नस भरू नका. खरे खोटे सांगणा-यांची मदत घ्या. वर वर चांगला दिसणारा माल साठवू नका. विसार देऊन उधार घेऊ नका. ह्या जन्माचा विचार पुढल्या जन्मी करू, असे म्हणू नका. रोख ठोक व्यापार करा. हे दोन आणि असे इतर काही थोडेसे तुकारामाचे अभंग अपवादादाखलच असल्यासारखे आहेत. एरवी त्यांनीही तत्कालीन ओघाला अनुसरून वेळोवेळी उद्गार आढले आहेत. ते एका अभंगात म्हणतात:

प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही | एकही निदानी न घडे त्यासी ||
दोन्ही पेवांवरी ठेवू जाता हात | शेवटी अपघात शरीराचा ||
तुका म्हणे तया दोन्हीकडे धका | शेवटी तो नरकामाजी पडे ||
संसारसंगे परमार्थ जोडे | ऐसे काय घडे जाणते नो ||

ह्याही अभंगात तुकाराम म्हणतात: गुरांनी खाऊन टाकलेल्या चिपाडामध्ये गोडी नसते किंवा ढेकणांनी भरलेल्या बाजेवर झोप येत नाही. त्याप्रमाणे ह्या संसारात राहून परमार्थ साधता येत नाही. संसारातून काखा वर करा, म्हणजे परमार्थाच्या गोष्टी समजतील. तुकारामाचाच काय, तर सर्व देशांतील सर्वकालीन धार्मिक लोकांचाही साधारण समज असाच असतो. पण साधू, भोंदू, साव, चोर ह्या सर्वांमागे संसार हा लागलेलाच आहे. माशाला पाण्याबाहेर रहाणे कदाचित शक्य होईल, पण मनुष्याला संसाराबाहेर राहता येणार नाही. म्हणून परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीनेच करणे हे अत्यंत जरूर आहे. ह्या प्रापंचिक दृष्टीच्या उलट असणा-या लोकांचे तीन प्रकार आहेत.

पहिला प्रकार विज्ञानवादी लोकांचा. ह्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा विचा साध्या व्यावहारिक दृष्टीने करण्यात मोठा हलकेपणा वाटतो. एकदा एका मनुष्याने झाडाच्या एका बुंध्यावर बसलेली खार पाहिली. ती लगेच बुंध्याआड झाली म्हणून तिला पुन: पाहण्यासाठी तो बुंध्याभोवती वळसे घेऊ लागला. भीतीमुळे ती खारही बुंध्याला वळसे घालू लागली. ह्याप्रमाणे दोघांनीही झाडाभोवती कितीही फेरे केले, तरी त्या मनुष्याला ती खार काही दिसेना. हा प्रकार चालला असता त्या ठिकाणी चार विज्ञानवादी शहाणे जमले. आणि त्या मनुष्याची त्या खारीभोवती प्रदक्षिणा झाली किंवा नाही, ह्याविषयी त्यांच्यामध्ये मोठ्या कडाक्याने वाद सुरू झाला. एक पक्ष म्हणे ज्यअर्थी एकदा दिसलेली खार त्या बुंध्यावर फिरत होती आणि मनुष्य हा बुंध्याभोवती घिरट्या घालीत होता, त्याअर्थी एकदाच काय पण पुष्कळ वेळां त्याच्या तिच्याभोवती प्रदक्षिणा झाल्या. अशा रीतीने वाद मिटणे काय पण पुष्कळ वेळां त्याच्या तिच्याभोवती प्रदक्षिणा झाल्या. अशा रीतीने वाद मिटणे अशक्य झाले. कारण दोघांचीही दृष्टी व्यावहारिक नव्हती हे होय. प्रदक्षिणा ह्या शब्दाचा अर्थ खार स्थिर असताना तिच्या पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण बाजूने जाणे असा घेतला तर त्या माणसाची प्रदक्षिणा झालीच नाही. पण तिने व्यापलेल्या प्रदेशाच्या भोवती जाणे ह्या अर्थाने पाहता प्रदक्षिणा पुष्कळ झाल्या. ह्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा निर्णय करण्याला तिच्यापासून आपल्यास व्यावहारिक कोणता फायदा, गैरफायदा व्हावयाचा आहे ह्याकडे लक्ष पुरवावयास पाहिजे. जेथे हे धोरण नसते आणि केवळ मोघम सत्य स्थापित करण्याची सवय लागलेली असते, तेथे निर्णय होत नाही. किंबहुना निर्णयाची खरोखर जरूरीच नसते, अशा प्रकारच्या अव्यवहार्य विज्ञानवादाने फुरसतीच्या वेळी मानवी मनास केव्हा केव्हा व्यायाम आणि एक प्रकारचे सुखही होते. पण व्यावहारिक रीतीने आणि व्यावहारिक सत्य शोधून काढण्याच्या कामी ह्या व्यायामाचा आणि सुखाचा काहीच उपयोग होत नाही. युरोप, अमेरिका इत्यादी सुधारलेल्या पाश्चात्य देशांमध्ये प्रो. जेम्स आणि शिलरप्रभृती तत्त्वज्ञ लोकांनी ह्या अव्यवहारी विज्ञानवादावर अलीकडे मोठा जोराचा हल्ला चालविलेला आहे. हा मोघम विज्ञानवाद खोटा आणि निरूपयोगी आहे, संसारातील सर्व गोष्टींचा साधकबाधक दृष्टीनेच विचार करावा आणि सत्याचाही शोध ह्याच मार्गाने लागेल, अशा अर्थाचे निनिराळ्या भाषेमध्ये त्यांचे मोठमोठाले सुंदर ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. ह्या नवीन दर्शनाची “Progmatism, Humanism” इ. नावे आहेत. ईश्वरावर विश्वास ठेविल्याने मनाला तात्काळ शांती मिळते. व्यावहारिक फायद्याकडे पोहोचविण्यात कोणत्याही प्रकारचा हलकेपणा नाही. उलट, “ब्रह्मज्ञान्याघरी भक्तीचा दुष्काळ| शब्दांचा सुकाळ खटाटोप|” ह्या वचनामध्ये तुकारामानेही आपला कल व्यावहारिक दृष्टीकडेच दाखविला आहे. मोठमोठे शब्द आणि कल्पनाही शून्याहीपेक्षा कमी आहेत. विज्ञानाच्या भपक्याने आमचे व्यावहारिक हितसंबंध निस्तेज झाले आहेत, ते पुन: सतेज केले पाहिजेत. दूरच्या गोष्टींचा मोघम विचार करणा-यांच्या हातून हिसकावून घेऊन, ते आमचे हितसंबंध व्यावहारिक दृष्टीने विचार करणा-यांच्या हाती दिले पाहिजेत. धर्मगुरू आणि मठाधिपती हे आपल्या मतलबासाठी ह्याच्या आड येतील पण त्यांना जुमानू नये. आम्ही प्रापंचिकांनी विज्ञानाला कायमचा नमस्कार ठोकला तरी बरेच.

दुसरा प्रकार दैववादी लोकांचा. ह्यांना स्वत्वाची किंवा व्यक्तिस्वातंत्र्याची चाड नसते. पराधीनपणात त्यांना सुख आणि समाधान वाटते, आणि आपल्यावरील कर्तव्य-जबाबदारीचा बोजा उतरला असे वाटते. हरी असेल तर देईल म्हणून ते खाटल्यावर स्वस्थ बसलेले असतात. जणू काय आपले अस्तित्व स्थापन करण्याची जबाबदारी राखण्यासाठी ह्या परपुष्ट लोकांना खुष ठेवणे हरीलाच जरूर आहे. दैववादी नुसते आळशीच असतात असे नाही, तर काही अगदी भोळे असतात. त्यांना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणे म्हणजे ईश्वराचे अपार सामर्थ्य न ओळखून त्याचा एक अपराध करणेच आहे असे वाटते पण ही मोठी चूक आहे.

कसरतीच्या खेळामध्ये एकादा डोंबारी आपण उताणा पडून आपल्या हातापायांवर दोघाचौघांना सावरून धरून त्यांच्या खांद्यावर दोन-चार मुले देऊन एक मनुष्यप्राण्याची अजब इमारत आपल्या अंगावर तोलून धरलेली अशी दाखवितो. पण ती माणसे सर्वांचे खाली पडलेल्या डोंबा-याच्या आधीन असतात. एकादा इंजिनियर दगडाची एक मोठी इमारत रचून आपण वेगळा झालेला असतो. एकदा कळाशी साधल्यावर ते दगड इंजिनियरवर अवलंबून नसतात. ह्यावरून त्याच्यामध्ये डोंबा-याच्या हातापायांवर उभे राहिलेल्या माणसांहून अधिक स्वाधानता असते. एकदा माळी लहानमोठ्या झाडांची एकदी सुंदर बाग निर्माण करतो. पाणी घालून एकदा वाढवून दिल्यावर ती झाडे पुढे आपल्याच वाढीने वाढू लागतात, म्हणून त्यांच्यामध्ये वरील इमारतीच्या दगडांहूनही अधिक स्वाधीनता असते. एकाद्या गुरूकुलामध्ये अनेक शिष्य काही काळपर्यंत गुरूच्या हाताखाली शिकून तयार होऊन पुढे ते पूर्ण स्वाधीन सदगृहस्थ बनतात. ह्या चार उदाहरणांवरून आपल्या आश्रितांना स्वाधीनता देण्यामध्ये डोंबा-याहून इंजिनियर श्रेष्ठ, त्याहून माळी श्रेष्ठ आणि सर्वांहून गुरू श्रेष्ठ हे उघड होते. आता सर्व गुरूंचा जो आदि गुरू अखिल विश्व चालविणारा विश्वेश्वर तो ह्या डोंबा-याहून कनिष्ठ किंवा ह्या गुरूहून श्रेष्ठ म्हणावयाचा? आम्ही सर्वस्वी पराधीन व्हावे अशी त्याची इच्छा असल्यास तो डोंबा-याहून कनिष्ठ आणि अंती आम्ही स्वतंत्र अथवा मुक्त व्हावे अशी त्याची इच्छा आणि धोरण असल्यास-आणि ते तसेच खास आहे-तर तो सर्वांहून अनंतपटीने श्रेष्ठ असा आहे.

तिस-या प्रकारचे लोक वैतागी असतात. गृहकलह, देशकलह, राष्ट्रकलह, यशापयश, अनेक खासगी आणि सार्वजनिक निराशा आणि अपमान इत्यादिकांमुळे त्यांची मने भंडावून गेलेली असतात, आणि त्यांची आयुष्यात अरूची झालेली असते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार मिरविणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डाग देण्यासारखे त्यांना होते. तथापि ही त्यांची वृत्ती सत्याची खूण नव्हे. ती आमच्या स्वाभाविक स्थितीचे द्योतक नव्हे. संसारात कितीही हालअपेष्टा आल्या तरी आपल्यामध्ये जी एक साहजिक विनोदवृत्ती असते, तिला बाधा येऊ देऊ नये. लहान मुलांमध्ये उचंबळणारा आनंद, त्यांचा कौतुकी स्वभाव आणि साहजिक सहनशक्ती आपण होता होईतो कायम ठेवीत गेले पाहिजे. निदान आपल्या व्यक्तिविषयक वैतागाच्या पायावर आपले तत्त्वज्ञान रचू नये, आणि कोणी तसे ते रचल्यास इतरांनी त्यास का उगाच बळी पडावे?

आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून आम्ही ज्या प्रपंचामध्ये वावरत आहो, त्याची थोरवी आणि पवित्रता ध्यानात येईल. प्रपंच म्हणजे बेडी किंवा बंदिवास नव्हे. प्रथमपासून शेवटपर्यंत गर्भवासाच्या पूर्वापासून स्मशानयात्रेच्या पलीकडे हा अनंतमार्गाचा प्रपंच म्हणजे आमच्यापुढे ईश्वरानेच आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उभारलेली एक शिडी आहे. तिच्यातील कोणत्याही पायरीची अवहेलना करणे म्हणजे ईश्वरी योजनेसंबंधाने आक्षेप घेणे होय, मग सर्वच शिडीविषयी तिरस्कार दाखविणे म्हणजे धर्माच्या नावावर धर्मलंडपणा माजविणे होय. प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नाही. ती शब्दांनी मात्र भिन्न, पण वस्तुत: एकच व अभेद्य आहेत. ही द्वंद्वाची भाषाच आमच्या तोंडातून निघून गेली पाहिजे. धार्मिकांनी आपला सोवळेपणा टाकला पाहिजे. बाह्य सृष्टीभोवतालचा संसार, आणि आपले मन ही सर्व ईश्वरमय आहेत, ईश्वराच्या वस्तीने ती क्षणोक्षणी पवित्र होत आहेत असे जाणून आम्हीं सदा नम्र आणि सुखी असलें पाहिजे.

नैराश्यवाद

(ता. २५-४-१० रोजीं प्रार्थनासमाजांत केलेल्या उपदेशाचा सारांश.)

भक्त देवाजीचे भोळे | त्यांचे पायीं ज्ञान लोळे ||
भक्तीवीण शब्दज्ञान | व्यर्थ अवघें तें जाण ||
नाहीं ज्याचें चित्तीं भक्ति | जळो तयाची व्युत्पत्ति ||
नामा म्हणे ऐसें जाण | नाहीम भक्तीसी बंधन ||

जे भोळे लोक असतात त्यांच्या पायी ज्ञान लोळत असते. जे भक्त नाहीत त्यांचे शब्दज्ञान व्यर्थ होय. जे भक्त ते मुक्त होत. त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. प्रेमाच्या महत्त्वाबद्दल अशाच प्रकारचा दुसरा एक उल्लेख आहे. (सेन्टपालचे कारेथकरास पहिले पत्र) तो असा :- (१) मनुष्याचे व देवदूतांचे वक्तृत्व माझ्या ठायी असले परंतु मजमध्ये प्रेम नाही तर नाद करणा-या पितळेच्या भांड्याची किंवा वाजवावयाच्या झांजेची व माझी योग्यता सारखीच. (२) मला धर्मज्ञानाची प्रेरणा होत असली, सर्व गूढ गोष्टी व विद्या अवगत असल्या आणि श्रद्धेच्या जोरावर डोंगर हालविण्याची शक्ती मजमध्ये असली, परंतु मजमध्ये प्रेम नाही तर मी काहीच नाही. (३) आणि मी आपली सर्व संपत्ती गरिबांना अन्नदान करण्यात खर्च केली, किंबहुना आपले शरीर जिवंत जाळण्यासाठी देऊन टाकिले, परंतु मजमध्ये प्रेम नाही तर मला काही लाभ नाही. (४) प्रीती आहे तेथे सहनशीलता नांदते, द्या नांदते, तेथे हेवा राहत नाही, तेथे अहंकार नाही, डौल नाही, स्वार्थ रहात नाही, चीड येत नाही, अपकार ध्यानात येत नाही. (५) असदाचरणाचा कंटाळा येतो, सत्यात आनंद वाटतो. (६) सर्व काही चालते, सर्वांचा विश्वास वाटतो, सर्वांची आशा वाटते, सर्व सहन करता येते. (७) प्रीती कधी हताश होत नाही.

मानवी संसाराकडे पाहिले तर हा संसार सुखमय आहे का दु:खमय आहे ह्याबद्दल मनुष्याची त्रेधा उडते. निराशावादी लोक संसाराचे अंध:कारमय चित्र रेखाटतात. विनोदी लोकांच्या लेखामध्ये देखील निराशेचे विष कालविलेले असते.

मार्क टवेनसारख्या विनोदी माणसांनी देखील एके ठिकाणी निराशा उत्पन्न करणारे उद्गार काढिले आहेत ते असे: “ज्याने संसारामध्ये अनुभव येण्याइतके बरेचसे दिवस काढिले आहेत त्याला मूळ पुरूष जो आदम त्याचे आपण किती ऋणी आहो हे समजते. त्याने मनुष्यजातीवर कोमता उपकार केला म्हणाल तर त्याच्यामुळे जगात प्रतम मरम आले हा होय.” “जन्म झाला असता आनंद व मृत्यूमुळे मनुष्य दु:खी होतो तो का? कारण तो प्रसंग आपणावर नसतो म्हणून.” येणेप्रमाणे संसारात दु:ख आहे, एवढेच नव्हे तर सर्वांत श्रेष्ठ प्राणी जो मनुष्य तो सर्वांत नीच कसा आहे ह्याविषयी खालील वचने दिली आहेत:- (पर्शियन कवी सादी म्हणतो) “मनुष्य हा कुत्र्यापेक्षाही कृतघ्न आहे. कुत्र्याला शंभर खडे मारून एक भाकरीचा तुकडा त्याच्या पुढे टाकिला तर तो त्या खड्यांचे दु:ख विसरून जाऊन भाकरी देणाराचे आभार मानतो. पण मनुष्यावर शंभर उपकार केले व एक अपशब्द बोलल्यास तो ते शंभर उपकार विसरून तेवढा अपशब्दच ध्यानात ठेवील.” अशा प्रकारचे  मनुष्यस्वाभावाविषयी सादीचे मत आहे. विकास पावलेल्या अमेरिका देशातील मार्क टवेननेसुद्धा सादीवर ह्या बाबतीत वरचढ केली आहे. तो म्हणतो- “भूकेने मरत पडलेल्या कुत्र्याला तुम्ही उचलून जर त्याला उत्तम प्रकारे पुष्ट केले तर तो तुम्हांला चावणार नाही. असा हा मनुष्य व कुत्रा ह्यांत फरक आहे”. अगदी रानटी देशापासून तो अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातील विनोदी मनुष्याकडूनही असे प्रतिपादिले आहे. असा हा संदेश जर निराशावादी आहे तर उल्हासप्राप्तीकरिता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहावे? तत्त्वज्ञान्यांकडे जावे तर ते गंभीर, दु:खी व उदासी असतात, कवींकडे जावे तर त्यांची काव्ये इतकी काळ्या रंगाची दिसतात की ती आपणांस नकोशी वाटतात. मार्ग टवेनसारख्या विनोदवाद्याकडे गेलो तरी सुद्धा आमची निराशाच होते. तर संसार खरोखरच दु:खमय आहे की काय ह्याचा विचार केल्यास दु:खापेक्षा सुखच जास्त आहे हे आपणांस कळून येईल. सुखापेक्षा दु:ख जास्त वाटते ह्याचे कारण आपल्या अं:तकरणात प्रीती किंवा भक्ती नसते व त्यामुळे आपणांस सर्वत्र निराशा वाटते. भक्ती हेच एक सत्त्व आहे. संसाराशिवाय जर आपली सुटका नाही तर आपली दु:खावस्था का होते? हे आपण पाहू. संसार दु:खमय वाटण्यास पहिले कारण की, आपल्या भोवतालची परिस्थिती सदोष असते. परिस्थितीच्या दोषामुळेच जे शहर खेड्यापेक्षा सुखमय व्हावे, त्या शहरामध्ये मनुष्यास अनेक व्याधी जडतात. अशाच प्रकारची सदोष परिस्थिती मार्क ट्वेनची झाली. लहानपणी खोड्या व उनाडक्या करीत त्याचे दिवस सुखाचे गेले, पण पुढे त्याची परिस्थिती बदलली म्हणजे यशापयशामध्ये तो पडला. त्याची बायको मेली. दोन तरूण मुली मेल्या. व त्यामुळे त्यास संसार दु:खमय वाटू लागला. त्याच्या परिस्थितीमुळे त्याला संसार दु:खमय वाटला म्हणून आपणांसही तो तसा का वाटावा? नदीचे पाणी अस्वच्छ नसते. पण ज्या पात्रातून ते येते त्या पाण्याच्या परिस्थितीमुळे आलेला गढूळपणा ते पाणी शुद्ध करून काढून टाकिला पाहिजे. संसार दु:खमय वाटण्यास दुसरे कारण म्हटले म्हणजे स्वदोष हे होय. परिस्थिती चांगली आहे, पण सुसंधी दवडल्यामुळे जाणूनबुजून किंवा आळसाने त्याच्या हातून अन्याय होतात. अशा मनुष्याच्या दोषामुळेच त्याला जी हळहळ वाटते व संसार दु:खमय वाटतो त्याच्या बोलण्याकडे आपण लक्ष देऊन निराशावादी काय म्हणून व्हावे? तिसरे कारण मनुष्याचा मूळचाच दूषित स्वभाव हे होय. परिस्थिती चांगली असते. हातून काही दोष घडलेले नसतात, पण स्वभावच दूषित असतो. एकाद्या बाजाची सर्वांगे योग्य प्रमाणात असतात, पण त्याचे (Timber) लाकूड चांगले नसले तर जसा त्या बाजातून चांगला आवाज निघत नाही; त्याप्रमाणे जन्मत:च दु:खी स्वभाव असल्यामुळे त्याला सर्व संसारच दु:खमय वाटू लागतो. (१) परिस्थिती, (२) स्वदोष, (३) स्वभाव अशा तीन प्रकारच्या कारणांमुळे विशिष्ट व्यक्तींना संसार दु:खमय वाटत असतो. पण त्यांच्या सांगण्यावरून आपणही संसार दु:खमय आहे असे म्हणू नये. बंधुभगिनींनो, आपली तशी परिस्थिती आहे का? स्वदोष आहेत का? व आपला स्वभाव तसा आहे का? ह्याचा पूर्ण विचार करून दोष असतील ते काढून टाकण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आपली मूळ स्थिती सुखरूपच आहे हे कळून येईल. जे दु:खी लोक दुस-याचे दु:ख ऐकतात त्यांची तर संसार दु:खमय आहे अशी बालंबाल खात्री झालेली असते. ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ त्यांना त्याच्या विरूद्ध कितीही सांगितले तरी ह्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. मग संसारच जर दु:खमय तर देव कोठला असे त्यांना वाटू लागते. पण ज्यांच्यावर असा प्रसंग आला नाही त्यांनी खरे कारण शोधून काढून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. लहान मुलाला स्वभावाची जाणीव नसते म्हणून ते उल्हासी असते.

सुदैवाने तशीच स्थिती राहिली तर बरे, पण दुर्दैवाने परिस्थितीमुळे एकादा दोष जडला तर तो आपण काढून टाकिला पाहिजे. जगत् जर दु:खी तर त्यात आम्ही राहणारे दु:खीच होणार, सुखी कोठून होणार अशी भ्रामक समजूत कोणी करून घेऊ नये. बुद्धाचेसुद्धा हेच सांगणे आहे. ते म्हणतात ‘दु:ख दु:ख म्हणून जे आहे ते काल्पनिक नव्हे, खरोखरीचे आहे, पण त्यास कारण आहे. ते निवार्य आहे, अनिवार्य नाही, तुम्ही स्वयंभू आहा, दु:ख स्वयंभू नाही. तुमच्या ठिकाणचे दोष काढून टाका. सुखदु:खाची वजाबाकी केली तर सुखच जास्त आहे हे तुम्हांस कळेल. ‘निराशेचे जेव्हा वारे सुटते तेव्हा आपणांस सुखाची विस्मृती होते. ह्याकरिता हा संसार सुखमय वाटण्यास शिरोभागी दिलेल्या नामदेवाच्या अभंगात सांगितल्याप्रमाणे आपण जर भोळी भक्ती कायम ठेविली तर आपल्या ठिकाणी सर्व ज्ञान येईल.

निवृत्ती व प्रवृत्ति आणि अवतारवाद व विकासवाद

(साता-यास झालेलें व्याख्यान. सु. प. ता. २१-५-१९०५.)

त्याग तरी ऐसा करा | अहंकारा दवडावे ||१||
आपुले मरण पाहिले म्यां डोळां | तो झाला सोहळा अनुपम्य ||१||
सकल चिंतामणी शरीर |

आमच्या मंडळीच्या सुधारणेची दोन अंगे आहेत. एक धार्मिक व दुसरे सामाजिक. कोणी आमच्यातीलच म्हणतो की, धार्मिक अंग नुसते राखावे. आमच्या भजनाला, उपासनेला, कोणी फारसे किंवा मुळीच आड येत नाहीत व यायचेही नाहीत, पण तुम्ही सामाजिक खटाटोपी करू लागाल, तर मात्र पदोपदी अडथळे आणून घ्याल. पण माझे म्हणणे असे की, धार्मिक सुधारणा करू की सामाजिक करू किंवा कोणती आधी करू, हा जो प्रश्न आहे तो आपल्यामधील अहंकार गेला नाही म्हणूनच पुढे येतो असे म्हटले पाहिजे. धर्मविभूती, आध्यात्मिक सुधारक, ज्याला पुढे लोकांत अवतार किंवा मग देवच म्हणतात, अशांचे एक तरी उदाहरण डोळ्यापुढे आणा की, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता-धार्मिक साधने, सुधारणा करू व सामाजिक सोडून देऊ का? त्यांना कधी ह्याबद्दल संशय नव्हताच, कारण, त्यांची रहाटी अगदी कडेलोटपणाची होती. आजकालच्या लोकांनी अहंकार समूळ सोडला पाहिजे. इंग्रजीत म्हणतात,

If you want to gain, you must loose yourself first; die to live…..

म्हणजे जर मिळवावयाचे आहे तर हरवून घ्या आधी. खरोखरीच विरोधाभास दिसतो आहे हा. नाही तर काय? म्हणे भरा. कशासाठी? तर जिवंत राहण्यासाठी, पण ह्यातील तत्त्वाकडे दृष्टी दिल्यास ह्या वचनाची सत्यता लक्षात आल्यावाचून राहणार नाही.

तुमच्यापुढे हे द्वैत वा-यासही उभे न राहता तुमचे आचरण सर्वकाळ ईश्वरास स्मरून व अहंता, अहंकार, अहंभाव ह्यांस विसरून होत राहिले, म्हणजे मग तुम्हांला वाराणसीसारख्या तीर्थस्थानी जाण्यास नको. ती वाराणसी, आणखी तिच्या पलीकडे काही दुसरी काशी असली तरी ती तुमच्याजवळ येते आहे. कारण हे पहा, तीर्थाला तीर्थपम आले कोठून? तर साधूशी त्याचा पूर्वसमागम घडला होता म्हणून. मोठी जाडी विभूती आध्यात्मिक व कर्ती सुधारक अशी मुळाशी असल्यामुळेच तर तीर्थाचे माहात्म्य. असा हा तुमचा अधिकार वाढेल. तुकोबांनी म्हटले आहे की, “आपुले मरण मी पाहिले” अहम, अहंकारवृत्ती त्यांच्यामधून समूळ निघून गेली, तो सोहळा काय अनुपम| ह्याबरोबर सहज हेही दिसते की, साधूंची वचने बहुतकरून विरोधाची असतात किंवा वाटतात. इतका नेटाचा विचार त्यांच्या अंत:करणात येतो की, ‘वाचमर्थोSनुधावति’ असे मग होते. पण याहून जास्त विचार करून पाहू की मीपणाचा काय सर्वस्वी नायनाट होतो किंवा करावयाचा की काय? तर तसे नसून मीपणाचा विस्तारच करून सर्वात्मकपणे भोग झाला हा अनुभव घ्यावयाचा. आत्मवृत्ती संकोचित न करता तिचा परिघ एकसारखा पसरतच रहावयाचा. हे जर आपणांस कर्तव्य नसेल, हा प्रवृत्तीमार्ग न आवडून निवृत्तिमार्ग श्रेष्ठ वाटत असेल तर निवृत्ती, निवृत्ती म्हणजे कोठवर खरोखर गेली पाहिजे हे लक्षात घ्यावे. म्हणजे हे तुम्ही कबूल कराल की, शेवटी दोरीने गळ्याला फास लावून घेतला पाहिजे. तेव्हा सुटला एकदा मानवप्राणी! ह्या सांसारिक आत्मयातनेतून, मिळाला त्याला मोक्ष! पण ह्याला मोक्ष म्हणायचे नाहीच. पशूला वाटते की वर शिंगे, खाली पाय, ह्यामधला जो तो मी. परंतु मनुष्याला स्वाभाविकच स्वत:पुरते पाहून समाधान नाही. त्याचा मी हा मध्यबिंदु सर्व स्थितीत खरा, पण त्याचा जवळचा परिघ घेतला तर त्याचे स्वत:चे कुटुंब होय. बहुतेक सुधारलेल्या मनुष्याची मजल म्हणजे त्याचा परिघ आजकाल पाहिले असता स्वत:च्या राष्ट्रापर्यंत जातो. हिंदुस्थानाची सीमा काय बुवा, तर उत्तरेस हिमालय पर्वत वगैरे सुरूवात करून इतक्याच प्रदेशाशी फक्त आपला निकटचा किंवा तात्त्विकतेचा ही संबंध, तितक्यापुरताच काय तो अभिमान. पण मी खरोखरी उत्तम झालो केव्हा समजायाचे किंवा याचा अर्थ काय, तर माझ्या सहानुभूतीचा, नव्हे, आत्मप्रचीतीचा परिघ अनंत वाढलेला आहे व मध्यबिंदूशी मी आहे. अहंभावाचा ताठा मिरविणा-याने डोळे उघडून विचार करून पाहिले पाहिजे की, अरे मी आपणांस म्हणतो, पण मी म्हणजे कोण? कोठेसा आहे? ह्या अफाट विश्वाच्या एका कोप-यात, कोठला तो कोपरा, कोप-यातल्या कोप-यात कोणता अंश म्हणावा, अंशाचा कोणता अंश म्हणावा, काहीच नाही, इतकी क्षुल्लक जागा व्यापणारा प्राणी मी, माझी मातब्बरी काय की, मी गर्वाने फुगून नेहमी कु-र्यातच असावे? ह्याचा त्याग झाला असता नारायम म्हणजे नराचे अयन ज्याच्यामध्ये त्याने समर्याद, क्षुद्र, आकुंचित जगातून उमटून आपल्याला आपल्या अंगाशी लावून घेतले असा अनुभव येतो.

तेव्हा तात्त्विकदृष्ट्या विचार केला असता मी म्हणतो की, निवृत्तीचा मार्ग न पत्करता जाज्वल्य प्रवृत्ती करावयाची. ह्याने किती लोकांचा भरिभार आपल्यावर घेतला पाहिजे ह्याचा विचार करा. प्रेसिडेंट रूझव्हेल्टचे उद्दिष्ट असे आहे की, नेहमी सात्त्विक युद्ध करीत राहिले पाहिजे. आपल्याकडे तुकारामबुवाही म्हणतात की ‘रात्रंदिवस आम्हांला युद्धाचा प्रसंग’. मी तरी समजतो निवृत्ती म्हणजे नाशच, मेल्यापेक्षा अहंकार तरी असू द्या. चालता चालता कधी तरी ठेच लागेल व मन ताळ्यावर येईल म्हणायाला जागा राहते. कृष्णाने अर्जुनाला अखेरचा निरोप अट्टाहासाने प्रवृत्तीविषयकच सांगितला आहे. तो त्याला म्हणतो, अरे ह्यापेक्षा तुला काय सांगू, मी जर अव्यक्तातून व्यक्त होतो आहे, मी प्रवृत्त आहे, तोपर्यंत तू निवृत्तीची कथा सांगू नकोस.

आता तुम्ही विचाराल, कायहो, ज्याला परिघ अनंत, त्याचा मध्यबिंदू कोठे आहे? तर गणितशास्त्राच्या नेहमीच्या रीतीने पाहिले, तर तो बिंदू पाहिजे तेथे असू शकेल. संकुचित अहंकार सोडायला पाहिजे व जी विश्वाची संपत्ती त्याचा अभिमान, त्याविषयी आनंद, काळजी, कर्तबगारी दाखविली पाहिजे. मनुष्य एकसारखा प्रवृत्त, कार्यकारी, कर्मी, कर्मप्रचुर आहे, निवृत्त कधी नाही-अशा प्रकारे ज्यांचा दुराभिमान गेला आहे, त्यांच्यानेच काही काम झालेले आहे. ज्यांच्या ठिकाणी एकतानता, प्रामाणिकपणा, निष्कामता, धैर्य, जे व्रतस्थ, ज्यास अपेक्षा नाही, त्यांचेच हातून सुधारणेची कामे होतात. जे पाऊल टाकायचे, ते निश्चयाने, धैर्याने टाकावयाचे आहे.

आपण म्हणाल “ अहंकाराचा परिघ अमर्याद करा असे सांगता पण ह्या सांगण्या-बोलण्याच्याच गोष्टी आहेत. असे ज्याचे हातून होईल तो पुरूष अवतारच म्हटला पाहिजे, तो हजारो वर्षांनी येतो. कोणी तरी आम्हांला असा चांगला नायक, सेनापती, प्रमुख, म्होरक्या, अशी एक विभूती प्रखर तेजाची पाहिजे.” पण ह्याला माझे उत्तर असे आहे की, खरोखरी प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. अवतार मी अनिष्ट म्हणत नाही, इष्टच आहे, पण त्याने होते काय, तर काही काळपावेतो त्याच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उदाहरण तेजस्वितेने परिणाम होतो, आपण एकदम खालून वर उचलले जातो. पण तो स्वाभाविक क्रमिक विकास म्हणावयाचा नाही. तर प्रत्येक आत्म्याचे मरण मरून प्रत्येकास स्वत:च्या श्रमाच्या मोबदल्यात आनंद झाला पाहिजे. ‘आत्मैव आत्मनो बंधु:’ या तत्त्वाचा स्वीकार करून आपण आपल्याच पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे व राहिले पाहिजे. मला इतकेही वाटते की आज जी काय आमच्यात आत्मकला अंशभूत आहे, इच्छाशक्ती, बाहुबल, एक-एक पाऊल स्वत: पुढे टाकण्याची शक्ती आहे, ती जाऊन, अवतारी व्यक्तीच्या विद्युदाकर्षणाने एकदम कामे फार होणार असतील, तर तो अवतार नको, व ती कामेही पण नकोत! विकास, विकासच झाला पाहिजे हेच मी धरून बसेन. अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार उंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले असा विषमभाव मला पसंत पडत नाही. तर सर्वांची सर्व बाजूंनी व तीही स्वत:चे प्रयत्नांनी उन्नती होत जावी, हेच श्रेयस्कर. अवतारांची गरज भासू लागल्यास समजावे येथे रोग आहे, स्वाभाविक स्थिती ही नव्हे, स्वत:चा दम संपला, स्वयंशक्ती हरपली, स्वत:चा जोर नाहीसा किंवा कमी तरी झाला. पण चांगल्या सुदृढ राष्ट्रात स्वयंस्फूर्ती हा एक गुण असतो, म्हणजे कोणतेही कृत्य स्वत: आपल्यास कळलेल्या दिशेने करण्यास अंगावर घ्यावयाचे. त्या राष्ट्राच्या विभूतींच्या व सामान्य लोकांच्यामध्येही मग इतके अवाढव्य अंतर नसते, हेही लक्षात ठेवले पाहिजे.

तेव्हा मी म्हणतो की आमचा परिघ वाढविण्याची आमची योग्यता असताना, ईश्वराजवळ का होईना, पण ही काय याचना करावयाची की आम्हांला अवतार द्या, आपला अवतार होऊ द्या, नाहीतर आम्ही मागे मागे जाऊ. अवतारमत खरे असले तरी मी तर म्हणेन की, परमात्मन् तुमचे आजपर्यंत पुष्कळ अवतार झाले असतील, पण आता तुमचा तो क्षीरसागर, ते स्वर्गनिधान वगैरे सोडून खाली मनुष्यलोकात येण्याची तसदी घेऊ नका. तर आमचा विकास तुम्हीस करा. तरच तुमच्या एकंदर विश्वयोजनेस आमच्याकडून साह्य होईल !

निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन

(बेळगांव येथील म्युनिसिपल हॉलमध्यें ता. २५ मे १९१२ रोजीं मेहरबान आर. सी. ब्राउन साहेब बेळगांवचें कलेक्टर ह्यांचे अध्यक्षतेखालीं झालेल्या भाषणाचा थोडक्यांत सारांश.)

मंडळीचें धोरण व जबाबदारी
ह्याविषयीं मंडळीनीं वेळोवेळीं शांतपणानें व स्पष्टपणानें खुलासा करावा तितका थोडाच आहे. कारण ह्या बाबतीत नव्या व जुन्या लोकांमध्ये, योग्यायोग्य कारणांवरून मंडळीच्या कामासंबंधी गैरसमज उत्पन्न होऊन इतर अनेक अपरिहार्य अडचणींमध्ये ह्या परिहार्य अडचणींची भर पडते. हजारो वर्षे अज्ञानाचे काळोखात पडलेल्या ह्या कोट्यवधी हीन जातींमध्ये आज एकदम आधुनिक शिक्षणपद्धतीच्या उजेडाचा लोट सोडल्यामुळे त्यांचा मोठा समाज विचकून अस्वस्थ होईल व कदाचित स्थापित राजसत्तेस अपाय पोहोचेल असा पहिला आक्षेप निघण्याचा संभव आहे, पण ह्या गरीब जातीच्या सुदैवाने व सरकारच्या शहाणपणाने सरकारचे सहानुभूतिपूर्वक लक्ष ह्या प्रश्नाकडे ही मंडळी निघण्यापूर्वीच कित्येक वर्षे लागले असल्यामुळे वरील वेडगळ आक्षेप बहुतेक मुळीच घेण्यात आला नाही असे म्हणण्यास हरकत नाही, उलट इलाख्याच्या अधिपतीपासून तो जिल्ह्याचे अधिपतीपर्यंत सरकारी अधिका-यांनी वेळोवेळी ह्या कार्यास प्रोत्साहन दिले आहे. हेही मंडळी जाणून आहे व तदनुरूप तिचे वर्तन आहे.

दुसरा महत्त्वाचा पण वरच्या इतकाच भ्रममूलक आक्षेप असा निघण्याचा संभव आहे की, आजपर्यंत निर्जीव अवस्थेत पडलेल्या ह्या प्रचंड समूहापूढे आज एकदम आधुनिक शिक्षण पद्धतीच्या द्वारा समता, स्वतंत्रता, बंधुता इत्यादी विक्षोभक तत्त्वांचे आदर्श ठेविल्यामुळे हा समूह जागृत होऊन वरील वर्गाचा द्वेष करू लागेल व सामाजिक युद्ध जुंपेल, ह्या आक्षेपात कादंबरी किती आहे व सत्य किती आहे हेही मंडळी पूर्ण जाणून आपले काम निमूटपणाने पण नेटाने करीत आहे, इतकेच नव्हे तर मंडळीच्या बाहेरील उतावळ्या वक्त्यांकडून विशेषतः अस्पृश्य आणि मागासलेल्या वर्गातील वक्त्याकडून जेव्हा जेव्हा ह्या बाबतीत हयगय होते तेव्हा तेव्हा मंडळीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

तिसरा एक चमत्कारिक आक्षेप धर्माच्या नावाने वस्तुतः धर्मपंथाच्या वतीने दोन परस्परविरुद्ध बाजूने घेण्यात येतो. तो असा :- ह्या मंडळीचे कार्य सुरू झाल्यापासून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचे कामी मोठा अडथळा आला आहे असे काही आमचे ख्रिस्ती मिशनरी बंधू ओरडू लागले आहेत. उलट बाजूने काही जुन्या हिंदुधर्माभिमानी मित्रांकडून असा आक्षेप ऐकण्यात येतो की आमच्या धार्मिक प्रयत्नामुळे ह्या वर्गातील धार्मिक आचारविचारांत ढवळाढवळ होऊन हे हिंदुत्वाला मुकतील. हे दोन्ही आक्षेप परस्परविघातक आहेत हे एक आमचे सुदैव आहे, इतकेच नव्हे, तर त्या त्या बाजूनेच ह्या काल्पनिक आक्षेपांचे क्रियात्मक निरसन होईल, अशी सहानुभूती व मदतही आम्हांला मिळत आहे. उदाहरणार्थ नुकतीच एका प्रसिद्ध अमेरिकन ख्रिस्ती मिशनरीने न मागताच आम्हांला स्वतःच्या खिशातून पैशाची मदत पाठविली आहे. उलटपक्षी ह्या वर्गातील धार्मिक आचारविचार उज्ज्वल आणि उन्नत हिंदुधर्मास शोभण्यासारखे नाहीत हे जाणून कित्येक वयोवृद्ध आणि ख-या हिंदुधर्माच्या अभिमान्यांनी मंडळीच्या निरनिराळ्या ठिकाणी तुकाराम, रामदास, इत्यादिकांच्या उपदेशांच्या द्वारे धर्म आणि नीतिशिक्षणाचे काम चालविले आहे.

उद्योगधंद्याच्या बाजूने, व्यावहारिक शक्यतेच्या दृष्टीने आणि इतर अनेक त-हेने मंडळीच्या कार्यासंबंधी वेळोवेळी लहानमोठ्या असंख्य शंका व हरकती घेण्यात येतात, आणि विशेषेकरून ह्या मंडळीचे प्रयत्न लोकाश्रयावरच केवळ अवलंबून असल्यामुळे मदत मागावयास गेले असता पावलोपावली अशा हरकतीतून अडखळत मंडळीला मार्ग क्रमावा लागत आहे. म्हणून शेवटी वरील सर्व आक्षेपकांना एवढीच विनंती आहे की, मंडळीच्या कार्यास प्रत्यक्ष थोडासा हातभार लावून पहावा, म्हणजे आपल्या आक्षेपांस कसा अवकाश मिळत नाही हे तेव्हाच दिसून येईल.

कर्नाटक शाखा
मंडळीच्या कार्याची आवश्यकता सर्व हिंदुस्थान देशभर आहे. विशेषेकरून जसजसे खाली दक्षिणेत उतरावे, तसतसे तर अशा प्रयत्नांची अत्यंत जरुरी भासते. मंडळीचे ठिकाण मुंबईस आहे व तिच्या शाखा मुंबई इलाखाभर असून बाहेर मध्यप्रांत आणि मद्रास इलाख्यातही त्या आहेत. तरी बाहेरील ह्या ब-याच ठिकाणी ह्याच कामाकडे वाहिलेला निदान एकतरी प्रतिनिधी असलेल्या अशा सुव्यवस्थित आणि नियमबद्ध शाखा नसून नुसत्या फावलेल्या वेळी काम करणा-या किंवा मदत पाठविणा-या सद्गृहस्थांच्या स्थानिक कमिट्या आहेत. निरनिराळ्या भाषा चालू असलेल्या निरनिराळ्या प्रांती एक मुख्य शाखा आणि मग तिच्या उपशाखा निघाल्याशिवाय मंडळीच्या कामास म्हणण्यासारखा जोर येणार नाही. अशा शाखा निदान कर्नाटक आणि गुजराथ ह्या प्रांती एक दोन वर्षांतच उघडण्याचा मंडळीचा निश्चय आहे, त्यांपैकी कर्नाटक शाखा उघडण्याची पूर्वतयारी करण्याकरिता मंडळीचे प्रतिनिधी हल्ली ह्या प्रांती फिरत आहेत. ह्या शाखेच्या दोन वर्षांचा खर्चाचा अंदाज सुमारे २।। हजार रुपयांचा असून सुमारे १। हजार कर्नाटकात ह्या फिरतीवर जमवावयाचा आहे. त्यांपैकी ५०० रु. मिळवून देण्याचे येथील मंडळीनी मनावर घेतले आहे. येथील चिकित्सक पत्राने आमच्या कामासंबंधाने सहानुभूतीपर लेख लिहिला, व त्यामुळे आमच्या कामास येथे इतकी रक्कम जमा झाली. एकदर्थ आम्ही चिकित्सकाचे आभार मानतो. तसेच ह्या बाबतीत येथील अत्यंत उत्साही वकील रा. रंगराव नाईक ह्यांच्या निःस्वार्थ खटपटीबद्दल व्याख्यात्यांनी फार आभार मानिले व अशीच मदत इतर शहरी मिळून शाखा एक दोन महिन्यांतच स्थापिली जाऊन त्यांचेबरोबर असलेले त्यांचे सहकारी मि. सय्यद अबदुल कादिर ह्यांच्या हवाली ती करण्यात येईल अशी उमेद त्यांनी प्रदर्शित केली.

बोर्डिंगची जरुरी
सरकार, लोकल बोर्ड आणि म्युनिसिपालिट्या ह्यांच्या आश्रयाखाली ह्या लोकांसाठी पुरेशा वस्तीच्या ठिकाणी शाळा आता बहुतेक इलाखाभर पसरल्या आहेत, पण त्यांपैकी पुष्कळ चालाव्या तशा चांगल्या चालल्या नाहीत. ह्याचे मुख्य कारण योग्य शिक्षकांची उणीव हेच होय. ही उणीव भरून काढण्याकडे मंडळीचे लक्ष लागावे असे मोठ्या अधिकारी लोकांनी बोलून दाखविले आहे व ह्या मंडळीलाही तसेच वाटत आहे. शिवाय कशातरी शाळा काढून पाच तास एकत्र बसविल्याने कार्यभाग न होता चालू शाळांतून हुषार व होतकरू मुले निवडून त्यांचा पुढील अभ्यासक्रम मंडळीच्या अधिका-यांनी खुद्द आपल्या नजरेखाली त्या मुलांना रात्रंदिवस आणि बारा महिने ठेवून घेऊन करवावा, म्हणजे त्यांचे शिक्षण चांगले होईल, इतकेच नव्हे, तर त्यांची चाल, रीत, भाषा आणि सर्व संवयी सुधारतील, ह्याच उपायांनी त्यांच्यात चांगले शिक्षक निपजतील व थोडक्याच काळात ते आपल्या जातीची आपणच सुधारणा करू पाहतील, म्हणून अशा प्रत्येक प्रांतातील मुख्य शाखांचे बोर्डिंग अथवा विद्यार्थी वसतिगृह हे मुख्य व जरुरीचे अंग आहे.

निराश्रित साहाय्यक मंडळी

हिंदुस्थानांतील अस्पृश्य मानलेल्या लोकांची स्थिति अत्यंत शोचनीय आहे व त्यांच्या उन्नतीसंबंधीं आपण कांहींतरी प्रयत्न केले पाहिजेत, असें वरिष्ठ वर्गांतील लोकांना पुष्कळ वर्षें वाटत आहे; पण आपल्या महराष्ट्र प्रांतात ह्या कामीं प्रथमतः खऱ्या प्रयत्नाला आरंभ केल्याचें श्रेय परलोकवासी श्रीयुत जोतीबा फुले ह्यांनाच द्यावें लागेल. त्यांच्याच श्रमानें पुणें मुक्कामीं ह्या लोकांसाठीं एक-दोन शाळा स्थापन करण्यांत आल्या. हल्लीं त्या तेथील म्युनिसिपालिटीच्या ताब्यांत आहेत. त्यानंतर ह्या हतभागी लोकांकडे ज्या दुसऱ्या उदार अंतःकरणाच्या पुरुषाचें लक्ष गेलें; ते परलोकवासी श्रीयुत रामचंद्र अण्णाजी कळसकर हे होत. ह्यांनीं प्रथम 'वांगी व्हिलेज एज्युकेशन सोसायटी' नावाची संस्था वांगी येथें स्थापन करून नंतर ती बारामती येथें नेली. ह्या संस्थेच्या आश्रयाखालीं त्यांनीं महार लोकांकरितां खेड्यांतून कांहीं शाळा उघडल्या होत्या; पण त्या फार दिवस चालल्या नाहींत. हें काम भरपूर द्रव्य साहाय्याशिवाय नांवारूपांस येणें शक्य नव्हतें; सरकार, संस्थानिक आणि श्रीमंत व्यापारी ह्यांच्याजवळ द्रव्यबळ आणि सत्ताबळ हीं असतात; पण तेवढ्यानें अशी कामें उदयाला येत नाहींत. हीं मुंबईसारखी धनाढ्य शहरें आणि इंग्रजांसारखें मातबर आणि न्यायी सरकार ह्या देशांत पिढ्यानपिढ्या असूनहि ह्या दीन लोकांचें भाग्य उदयास आलें नाहीं ह्यावरून उघड होतें. महानुभाव श्रीमंत सयाजीराजे ह्यांच्या कारकिर्दीत मात्र ह्या दीनांची बरीच दाद लागत आहे व अलीकडे कोल्हापूर येथेंहि बरीच चळवळ चालली आहे, पण कांही होवो; हें कार्य इतकें अवजड आहे कीं, तशीच असाधारण धर्मप्रेरणा झाल्याशिवाय आणि कोणत्यातरी एका नव्या जोमाच्या उदार पंथानें पुढाकार घेतल्याशिवाय ह्याला कांहीं रूप येईल, हें अद्यापि संभवत नाहीं.

प्रार्थनासमाज, ह्या कामीं हळूळहू पण बिनबोभाट आज बरींच वर्षें अल्पस्वल्प प्रयत्न करित आला आहे. मुंबई, पुणें, सातारा, अहमदनगर ह्या ठिकाणीं ह्या लोकांकरितां रात्रीच्या शाळा उघडून त्यांतून समाजाचे प्रचारक थोडाबहुत धार्मिक आणि नैतिक उपदेश आज बरीच वर्षें करीत आहेत. अलीकडे ह्या वर्गाविषयीं कळवळा वाटणारांना हुरूप येण्यासारखा एक नवीन प्रकार दिसून येतो, तो हा कीं, आज कित्येक वर्षें अज्ञान आणि कंगाल अवस्थेच्या चिखलांत रुतून गेलेल्या ह्या हतभागी लोकांतच स्वतःची स्थिति सुधारण्यासंबंधी जागृति दिसूं लागली आहे.

ह्या अपूर्व जागृतीस इंग्रजी राज्याचें औदार्य आणि त्या औदार्याची अपूर्णता ह्या दोन्ही परस्परभिन्न गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत. इंग्रजी राज्यांतील समतेच्या वागणुकीमुळें महारमांगांची लष्करांत भरती होऊन गेल्या दोनतीन पिढ्यांत ह्या वर्गांतील बरेच लोक हवालदार, जमादार आणि सुभेदार-बहादूर अशा पदवीला पोहोंचले होते. शिवाय, साहेबलोकांच्या खासगी तैनातींत बटलरचे वगैरे धंदेही इमानानें बजावून त्यांच्या साहजिक समागमानें ह्या वर्गांतील बरींच कुटुंबें अंमळ सुखवस्तु झालीं; पण ह्या बाबतींतील आपल्या उदार धोरणाचा विकास उत्तरोत्तर जास्त होऊं देण्याचें नैतिकधैर्य आणि शक्ति ह्या जातिभेदानें सडलेल्या देशांत इंग्रजबहादुरांच्याही अंगी कायम राहिली नाहीं व सुमारें पंधरा वर्षांपासून अलीकडे ह्या लोकांची लष्करांत पूर्वींप्रमाणें भरती होईनाशी झाली आहे.  पुढें येण्याला जो एकच मार्ग खुला होता, तोही अशा रीतीनें बंद झालेला पाहून ह्या लोकांचे आपल्या निराश्रित अवस्थेसंबंधीं डोळे किंचित् उघडूं लागले. ह्या बाबतींत प्रथम जे प्रयत्न झाले व अजून चालू आहेत; त्याचें बरेंचसें श्रेय पुणें येथील महार जातींतील पाणीदार गृहस्थ श्रीयुत शिवराम जानबा कांबळे यांजकडे आहे. श्रीयुत कांबळे ह्यांचा मुख्य रोंख जरी सरकारांत आपल्या जातीची पूर्वींप्रमाणें भरती व्हावी म्हणून कायदेशीर पद्धतीनें अर्ज करण्याचाच अद्याप आहे, तरी आपल्या जातीला शिक्षण मिळून तिचें पाऊल पुढें पडावें म्हणून त्यांचे दुसऱ्या बाजूनेंही अविश्रांत श्रम चालले आहेत. त्यांनीं 'सोमवंशीय समाज' नांवाची संस्था पुण्यास काढली असून तिच्याच नमुन्यावर अहमदनगर येथें श्रीयुत श्रीपतराव थोरात आणि पांडोबा डांगळे ह्यांच्या परिश्रमानें दुसरा एक 'सोमवंशीय समाज' सन १९०५ सालच्या जून महिन्यांत स्थापन झाला आहे. ह्या पूर्वीं नागपूराजवळ मोहपा येथें श्रीयुत किसन फागू नांवाच्या एका तरुण आणि स्वार्थत्यागी गृहस्थानें धर्माच्या पायावर एक समाज स्थापून चळवळ चालविली होती. मुंबई येथील प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनची कांहीं उदार मताचीं पुस्तकें वाचून ह्या तरुण गृहस्थाचें मन प्रार्थनासमाजाकडे वळले. प्रार्थनासमाजाविषयीं प्रत्यक्ष माहिती करून घेण्यासाठीं म्हणून मुंबई प्रार्थनासमाजाच्या १९०५ सालाच्या वार्षिक उत्सवाला श्रीयुत किसन फागू हे आले होते. तेथें पंधरा दिवसांच्या पाहुणचारामुळें त्यांची आणि समाजाच्या कांहीं मंडळीची ओळख होऊन परस्पर हेतूंची आणि प्रयत्नांची परस्परांस चांगली माहिती झाली. शेवटीं हे गृहस्थ समाजाच्या प्रीतिभोजनांतही हजर असल्याचें प्रसिद्धच आहे. ह्या ओळखीमुळें ह्या जातींतील आत्मोन्नतीसंबंधीं ज्या कांहीं चळवळी चालल्या होत्या, त्यांकडे समाजाच्या प्रचारकांचेंही बरेंचसें लक्ष वेधलें व पुढें लवकरच (हल्लीं परलोकवासी झालेले) स्वामी स्वात्मानंद आणि मी हे दोघे अहमदनगरास फिरतीवर गेलों असतां तेथील नवीनच स्थापन झालेल्या 'सोमवंशीय समाजा' मार्फत भिंगार नांवाच्या खेड्यांतील महारवाड्यांत आमचीं कांहीं व्याख्यानें झालीं.

लोकांची हळुहळु या विषयाकडे सहानुभूति वळूं लागली, आणि विशेषेंकरून मुंबई प्रार्थनासमाजाच्या आणि सोशल रिफॉर्म असोसिएशनच्या उदार मनाच्या अध्यक्षांनीं या कामांत बरेंच प्रोत्साहन दिल्यामुळें मीं एक निबंध लिहून त्यांत या लोकांची कशी स्थिति आहे, संख्या किती आहे, यांच्यासाठी कोणी काय काय केले आहे, या मुद्द्याचे विवरण केलें आणि शेवटीं यांना वर आणण्याकरितां एतद्देशीय लोकांनीं आपले पौरस्त्य आचार, रीतिरिवाज आणि परंपरा यांना धरून एक कायमचें मिशनच स्थापलें पाहिजे आणि तें सध्याच्या स्थितींत प्रार्थनासमाजाशिवाय दुसऱ्याकडून होणे विशेष संभवनीय नाहीं, असे विचार, उदार मतवादी समाजबंधूंपुढें मांडले. हा निबंध 'इंडियन सोशल रिफॉर्मर'च्या
ता. २९ जुलै १९०६ च्या अंकात प्रसिद्ध झाला व नंतर स्वतंत्र पुस्तकरूपानें छापून प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनच्या आश्रयानें त्याच्या पुष्कळ प्रती वाटण्यांत आल्या.

विचार केला, सहानुभूति मिळाली, निर्णय झाला, निश्चय झाला. तथापि 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' हें त्रिकालसत्य कधीं खोटें व्हावयाचें नाहीं. म्हणून ह्या तांदुळांची वाट कांही दिवस पहावी लागली.

  1. नाममंत्राचे सामर्थ्य
  2. धर्मसाधन
  3. धर्मसंघाची आवश्यकता
  4. धर्मजागृती
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107
  • 108
  • 109
Page 105 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी