1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

धर्म आणि व्यवहार

(ता. ६-११-१० रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)

केसी दिसो बरी | आम्ही आळविता हरि ||१||
तुका म्हणे देवा-ऐसी झालो करिता सेवा ||२||

सर्व विश्वातील व्यवहाराची मूळशक्ती जो परमेश्वर त्याला आळविल्याने म्हणजे त्याच्या धोरणाकडे लय लावल्याने आम्ही कशी उत्तम दिसू? फार काय पण, त्या शक्तीची सेवा करू तर-म्हणजे तिला अनुसरून आपले सर्व लहानसहान व्यवहार करू तर—आमच्यातील जी लहानशी प्राणशक्ती आहे ती ‘देवा-ऐशी’ म्हणजे त्या विश्वशक्तीप्रमाणेच मंगलकारक आणि समर्थ होईल? हा तुकारामांचा उद्गार आहे. तो आम्हांला किती पटतो ते पाहू.

वेळोवेळी आमच्या मनामध्ये उचंबळणा-या धार्मिक प्रवृत्ती आणि संसारामध्ये आमच्या हातून नित्यश: घडणारे व्यवहार ह्या दोन गोष्टी परस्परांपासून अगदी स्वतंत्र राखाव्या किंवा त्यांची भेसळ होऊ द्यावी ह्याविषयी पुष्कळांचा बराच मतभेद होतो. एक पक्ष म्हणतो आम्ही आपल्या धार्मिक प्रवृत्तींचा विकास स्वतंत्रपणे करून घ्यावा हे बरे. आपल्या धर्मसमजुती आम्ही आपल्याशीच ठेवाव्या फार तर आपल्या खासगी वर्तनाशी त्यांचा संबंध आणावा. पण आपल्या सार्वजनिक वर्तनाशी व कर्तव्याशी त्यांचा संबंध आणणे हे फार धोक्याचे व चुकीचे आहे. राजकारण, समाजबंधन, उद्योग,व्यापार, लोकशिक्षण इत्यादी मनुष्यांच्या सार्वजनिक व्यवहारांचे सुधारलेल्या देशांतून झपाट्याने बदलत चाललेले धोरण पाहिले असता सहज एक गोष्ट बिनचूक लक्षात येते, ती ही की, ह्या सर्व व्यवहारातून धर्मसंस्थांचा संबंध आणि धर्म समजुतींचा पगडा एकसारखा कमी कमी होत आहे. हा घटस्फोट कोठे कोठे जुलूमजबरीने, कोठे कोठे हाशीखुषीने तर कोठे कोठे अगदी नकळत आपोआप स्वाभाविक कारणांनीच होत चालला आहे. ह्यावरून हा पक्ष म्हणतो की, धर्मसंस्थांची आणि इतर संस्थांची फारकत होणे हेच इष्ट आणि अवश्य आहे. दुसरा पक्ष म्हणतो की, ह्या दोहोंमध्ये सांगड असावी. ह्या दोन्ही मतांचा इतिहास थोडक्यात असा आहे. धर्माच्या बाह्य आचारांचे प्राबल्य संसारातील सर्व व्यवहारावर वाजवीपेक्षा जास्त वाढून संसारात वेळोवेळी हरकती येऊ लागल्या आणि त्याची प्रगती खुंटली, ह्यामुळे वरील पहिला पक्ष अस्तित्वात आला. पण त्याचा अतिरेक दिसू लागल्यामुळे तडजोड करण्यासाठी हा दुसरा पक्ष उत्पन्न झाला. परंतु वस्तुत: पाहता धर्म आणइ व्यवहार ही स्वतंत्र ठेवावीत किंवा त्यांची सांगड घालावी असे म्हणणा-या दोहों पक्षांसही ह्या दोहींचा अर्थ नीट कळला नाही असे दिसते. ह्या दोहींची सांगड घालावयाची असे म्हणण्यामध्येही, ही दोन्ही स्वतंत्र ठेवावी असे म्हणण्याप्रमाणेच, ही दोन्ही परस्पर भिन्न आहेत, असा ध्वनी निघतो. ही दोन्ही तर मुळीच भिन्न नाहीत. जसे, निरनिराळ्या भोपळ्यांची त्यांना दोरीने एकत्र करून सांगड न घालता पोहणारा त्यांना घेऊन पोहू लागला तर ओघाबरोबर ते चोहीकडे वाहू लागून पोहणारा मध्येच बुडण्याचा संभव आहे, तसे धर्म आणि व्यवहार हे दोन भोपळे निराळे आहेत आणि त्यांना सांगड घालून एकत्र केल्याने आपल्याला सुरळीत पोहता येईल, अशातला प्रकार नाही. असे समजले म्हणजे आपल्या जीवनाची-राजकारण, समाजबंधन, उद्योग, व्यापार आणि लोकशिक्षण ही जशी निरनिराळी खाती आहेत त्यांतच धर्म हे एक वेगळे खाते आहे. आणि त्यामध्ये काही विशेष जादू आहे, ती जादू त्या खात्याचा निरनिराळ्या खात्यांशी संबंध लावून दिल्याने त्या सर्वांमध्ये शिरून सर्व संसारयंत्र सुरळीत चालेल असे समजणे होय. पण हा भ्रम आहे. धर्म हे निराळे एक खाते मुळीच नसून व्यवहाराच्या निरनिराळ्या सर्व खात्यांच्या तळाशी, मध्ये आणि शेवटी व्यापून रहाणारी आपल्यामधील ही वृत्ती आहे. शरीरात सर्व अवयवांमध्ये प्राण जसा शिखाग्रापासून नखाग्रापर्यंत व्यापून राहतो—तो जसा एक निराळाच अवयव नाही किंवा त्याचे एक शरीरामध्ये विशिष्ट स्थान नाही-तद्वत आमच्या व्यवहारात सर्वत्र निरंतर व्यापून राहणारी एक वृत्ती आहे. हिचा जसजसा दर्जा आणि जितका जितका जोर असतो तसतसे आमच्या सर्व व्यवहारांचे रंगरूप बदलत जाते.

ही वृत्ती मनुष्याचेच तेवढे सर्व व्यापार व्यापून आहे. मी परवा आमच्या निराश्रित साहाय्यकारी मंडळीची मनमाड येथील शाळा पहावयास गेलो होतो. तेथे प्रात:काळी ईश्वरोपासनेचा प्रसंग आला. मुलांनी शाळेची झोपडी झाडून निटनेटकी केली होती. मध्यभागी एक लहानशी वेदी ठेवून तिच्यावर शुभ्र वस्त्र टाकले होते. झोपडीभोवतालच्या बागेतून रंगीबेरंगी ताजी फुले आणून वेदीवर पसरली होती. आमच्या उपासनेस सुरूवात झाली. माझे लक्ष वेदीवरील फुलांकडे गेले तो तेथे एक कोळी आपले जाळे विणीत होता असे दिसले. आमचे उद्वोधन, स्तवन आणि प्रार्थना संपून उपदेशाची वेळ येईतोपर्यंत कोळ्याने वेदीचा पृष्ठभाग उतरण आणि आसमंतातील भाग ह्यांवर पसरलेल्या सर्व फुलांवरून आपले विस्तीर्ण जाळे पसरून फुलांच्या वासाने येणा-या लहान माशा आणि चिलटे ह्यांची मार्गप्रतीक्षा करीत तो स्वस्थ बसला होता आणि मुले उपदेशाची वाट पहात बसली होती. आता ह्याहून उपदेशाला अधिक योग्य विषय तो कोणता असणार! आम्ही उपासना करीत असताना आमच्यासमोर प्रत्यक्ष आमच्या वेदीवर जाळे पसरणा-या कोळ्याच्या व्यवहाराला जी वृत्ती कारणीभूत झाली होती ती, त्याचा धर्म आणि उद्वोधन, स्तवन आणि प्रार्थना करून ईश्वराकडे लय लावणा-या आमच्या व्यवहाराला कारणीभूत झालेली उच्च वृत्ती ती आमचा धर्म. ह्याप्रमाणे सत्त्वानुसार अधिकाधिक भिन्नभिन्न उन्नत व्यवहाराला कारणीभूत होणारी अधिकाधिक निरनिराळी खोल आणि विकसित वृत्ती असते. हाच धर्माचा आणि व्यवहाराचा अर्थ व त्याचा परस्पर अभेद्य संबंध आहे, हा त्या कोळ्याच्या उदाहरणावरून वस्तुपाठ माझ्याभोवती आतुर होऊन बसलेल्या अर्थिकांना मी दिला.

ह्यावरून मनुष्यप्राण्यामध्ये इतर खालील सर्व प्राण्यांचे प्रतिबिंब प्रसंगवशात दिसून येत आहे. खालपासून वरपर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार तो निरनिराळ्या प्रसंगी करीत असतो. आणि त्या निरनिराळ्या व्यवहारांत त्याची निरनिराळी वृत्ती व्यापून असते. म्हणजे तितके उच्च-नीच धर्म प्रसंगवशात त्याच्यामध्ये वावरत असतात. पण त्या उच्च-नीच धर्माचे तारतम्य जाणण्याचीही आमच्यामध्ये शक्ती असते. तिच्याद्वारे आमच्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये फरक पडत जाऊन हेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारे अनुसंधान आम्ही कायम राखल्यास शेवटी तुकारामाने म्हटल्याप्रमाणे “देवा-ऐशी झालो” असे आमच्या अनुभवास येईल.

देशभक्ति आणि देवभक्ति

(सोलापूर येथील रिपन हॉलमध्यें युवराजांच्या सन्मानार्थ ता. ११-११-०५ रोजीं झालेल्या रोषनाईच्या वेळीं दिलेलें व्याख्यान.)

धर्माचें कार्य शिरावर घेऊन आम्ही बाहेर निघतो तेव्हा आम्हांस नानाप्रकारची माणसे भेटतात. आणि त्यांच्याकडून आमच्यावर विविध प्रकारचे व केव्हा केव्हा तर अगदी विलक्षण आक्षेप घेण्यात येत असतात. त्यांपैकी असा एक आक्षेप
ब-याच वेळा अगदी स्पष्टपणे करण्यात आला आहे की, “काय हो तुम्हांला ही दुर्बुद्धी सुचली ! हल्लीचा काळ कोण चणचणीचा, चहूंकडे क्रांती किती झपाट्याने चालली आहे. इतर देश मी पुढे की तू पुढे अशी धूम ठोकीत आहेत, त्यात आमची कशी पिछेहाट होत आहे, अशात तुम्ही काय ह्या हरी भजनाच्या नेभळ्या गोष्टी सांगावयास निघाला आहा ! अहो, ही शांतीच्या वेळची कामे. तळीराम गार असल्यासच हे विचार सुचावेत, पण तुमचा तरी काय इलाज ! बुडत्याचा पाय खोलातच जावयाचा !!” सभाजनहो ! रामाची थोरवी गाण्याकरिता जसे रावणाच्या सामर्थ्याचे बळेच अवडंबर माजवावे, तद्वत केवळ हाणून पाडण्याच्या हेतूनेच मी हा वरील आक्षेप कल्पनेने आपल्यापुढे मांडिलेला आहे असे आपल्यापैकी साहजिक धार्मिक वृत्तीच्या ब-याच जणांना वाटण्याचा संभव आहे, पण तसा प्रकार नसून, खरोखरच असा आक्षेप अनेक वेळां आम्हांवर आला आहे. इतकेच नव्हे, तर तो इतक्या जोराने, उघडपणे व प्रामाणिकपणे आला आहे की, त्यावेळी आम्हांला केवळ नम्र होऊन ह्या आवेशाच्या लाटेला दूर जाऊ द्यावे लागले आहे. आता थोडासा विचार केल्यास दिसून येईल की, धर्माविषयी भलतेच ग्रह करून घेतल्यामुळे हा आक्षेप असा उपस्थित होत आहे. धर्मासंबंधी पहिली गैरसमजूत ही की, धर्म म्हणजे हल्ली जगात जे हजारो परस्परविरोधी पंथ माजले आहेत, त्यांतलाच एक कोणता तरी आपला म्हणून घेतलेला पंथ. इतकेच नव्हे तर त्या पंथात चालू असलेली अनेक बाह्यकर्मे आचार इत्यादी. दुसरी गैरसमजूत मोठा तात्विक विचार करूनही होण्यासारखी आहे ती ही की, धर्म म्हणजे केवळ निवृत्ती, जगत् सर्व मिथ्या आहे, आपली इंद्रिये ही भामट्याप्रमाणे आम्हांला फूस लावून भलत्याच मार्गाने ओढीत असतात. शहाण्यांनी ह्यांचा नाद सोडून अगदी स्वस्थ राहण्यास शिकावे, हाच अखेरचा पुरुषार्थ. ह्याप्रकारे व्यवहाराच्या बाजूने शुष्क कर्मठपणाचा व विचाराच्या बाजूने उदासीन निष्क्रियतेचा आरोप धर्मावर झाल्यास वरील विलक्षण आक्षेप निघावा ह्यात नवल ते काय ? कर्मठपणा व निष्क्रियता ह्या दोहोंच्या दरम्यान असणारा, आमच्या सर्वमान्य भगवद्गीतेत ठामपणे प्रतिपादिलेला कर्मयोग म्हणजेच धर्म, असे विरळा समजून येते. आणि हा कर्मयोग काही केवळ ज्ञानाने साधत नाही. आधुनिक शोधांच्या द्वारे विश्वाविषयी कितीही सम्यक् ज्ञान झाले, जड सृष्टीत नियमांचे कसे अबाधित साम्राज्य चालू आहे व तीच नियामक शक्ती जीवनसृष्टीचाही हळूहळू कसा विकास करीत आहे, प्रबुद्ध जीवात्म्यास तीच शक्ती कसे स्वातंत्र्य देते, पुन्हा त्याच स्वातंत्र्याचा बली ह्या विश्वयज्ञात अर्पण करण्यास म्हणजे विश्वातील भौतिक आणि नैतिक नियम हेच विश्वनियंत्याच्या ज्या इच्छा त्यांना केवळ अनुसरूनच जीवांनी आपल्या सर्व इच्छा दाखवाव्यात असाही शेवटी उपदेश अंतःकरणात त्याच आदिशक्तीकडून कसा होतो इत्यादी जरी निर्भ्रांत ज्ञान झाले, तरी वर सांगितलेला कर्मयोग साधत नाही. तो साधावयास ह्या आदिशक्तीचे अधिष्ठान जो ईश्वर त्याचे ठायीच केवळ भक्ती बाणली पाहिजे, म्हणून देवभक्ती हा विषय आजच्या व्याख्यानात येणार आहे.

पण आजचा प्रत्यक्ष प्रसंग काही देवभक्तीचा नव्हे, तर देशभक्तीचा होय. आम्ही जे येथे आज जमलो आहो, ते ईश्वरोपासनेकरिता नव्हे तर आमच्या ऐहिक स्वामीच्या सत्कारार्थ. चोहींकडे प्रकाशाचा लखलखाट करून ही जी आम्ही आरती ओवाळीत आहो ती देवाजीस नव्हे तर आमच्या भावी देशपतीस; अर्थात आमच्या देशकल्याणाची ही आरती आहे. युवराज हा आमच्या अदृश्य देशकल्याणाची दृश्यमूर्ती होय. त्याच्या जिवास अपाय किंवा बुद्धीस भंग झाल्यास आमच्या देशकल्याणास धोका आहे. युवराज जर आमचा देशपती नसता तर तो आला काय गेला काय आम्ही आज येथे मुळीच जमलो नसतो. पण तो आमचा स्वामी असल्याने त्याचा सत्कार करणे ही आमच्या देशाची एक सेवा आहे. तेव्हा अशा शुभप्रसंगी देशसेवेचा उत्तम मार्ग कोणता व त्याचा देशसेवेशी काय संबंध आहे हे पाहणे अत्यंत उचित आहे.

प्रथम हल्ली आपली देशस्थिती कशी आहे ती पहावी. प्लेग, दुष्काळ इत्यादी ज्या आधिभौतिक व आधिदैविक अनिष्ट परंपरा आम्हांवर ओढवत आहेत, तीविषयी येथे विचार करावयास नको. कारण ही अनिष्टे काही कायमची नाहीत. पण आमच्यातील आध्यात्मिक उणीव मात्र आम्ही सतत लक्षात बाळगली पाहिजे. इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका इ. जे पुढारलेले देश आहेत, त्यांच्यात राष्ट्रीय ऐक्य कसे अपूर्व दिसून येत आहे व तेच त्यांच्या सुसंपन्नेचा भक्कम पाया आहे. पण आमचा देश अद्यापि राष्ट्र ह्या नावालाही योग्य झाला नाही. जरी हळूहळू राष्ट्रीयत्व येथे बनत चालले आहे, तरी इतरांच्या मानाने ते फारच अपूर्ण आहे. सुखदुःखाच्या प्रसंगी युरोपातील काही राष्ट्रांचे वर्तन जणू एकाद्या व्यक्तीच्याच वर्तनासारखे एक धोरणाने झालेले माझ्या स्वतःच्या नजरेस आले आहे. प्रसंगास सहाध्याय, सहानुभूती व सहकार्य ही तिन्ही पूर्णपणे त्यांच्यात दिसून येतात. पूर्वी भरतभूमीत नवीन वसाहत करणा-या आर्य राष्ट्रांचीही हीच स्थिती असावी असे दिसते. तैत्तिरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्लीच्या व भृगुवल्लीच्या प्रारंभी व समाप्तीस –
सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु माविद्विषावहै ।।

हे वचन आढळते, ते त्या काळचे ब्रीदवाक्यच असावे असे दिसते. “आम्ही परस्परांचे संरक्षण करू, सहभोजन करू, मिळून वीरश्री संपादू, तेजस्वी असे अध्ययन करू आणि कोणाचाही द्वेष करणार नाही” असा ह्या उदात्त ब्रीदाचा अर्थ आहे. पण हल्ली ह्या ब्रीदाच्या व आमच्यामध्ये जमीनअस्मानाचे अंतर पडले आहे. तर अशा स्थितीत आमचे देशसेवेचे आद्य कर्तव्य म्हणजे राष्ट्रीय ऐक्य वाढविणे हे होय. पुढील सर्व कर्तव्यांचा हा पाया आहे. तो नीट न घातल्यास पुढील इमारत उठणारच नाही, किंवा कदाचित उठल्यास फार वेळ टिकणार नाही.

आता ही गोष्ट किती असामान्य आहे बरे ? एवढ्या मोठ्या देशाचे किंबहुना खंडाचे एकराष्ट्र बनणे व त्याचा एकजीव होणे म्हणजे सर्व मानवी इतिहासातील एक अपूर्व प्रसंग होय. ह्याच देशात नव्हे तर दुसरीकडे कोठेही व कधीही एवढ्या मोठ्या जनसमूहाचा व इतक्या विविध व विचित्र प्रकृतीचा एकजीव झालेला आढळत नाही. तर आपण पूर्वी कधी ह्या राष्ट्रीय दृष्टीने एका उच्च पदावर होतो व आता खाली आलो आहो अशी खोटी समजूत करून घेऊन आहे तोही उत्साह घालविण्याची ही वेळ नव्हे, तर मानवजातीच्या समष्टिजीवनाची एक नवीनच व उच्च पायरी आम्ही भारतीयांनी चढावी अशी नारायणाने योजना रचली आहे, तिला आम्ही आनंदाने व धैर्याने साधनीभूत झाले पाहिजे. ह्या कामी केवळ मानवी बुद्धीचे बळ अपुरे होत आहे. देवभक्तीचाच जोराने उदय झाला पाहिजे. जणू काय एका नवीन धर्माचीच स्थापना झाली पाहिजे. एवढे मोठे देशकार्य जर खरोखरीच व्हावयाचे असेल, तर त्यात ते पुढारी झाले असतील व होणारे असतील त्यांच्यात काही अपूर्व गोष्टींचा संचार व्हावयास पाहिजे. जे देवऋषी ह्या महायज्ञाचे अध्वर्युस्थान पत्करणार असतील त्यांचा –
उंची देवाचे चरण । तेथे झाले अधिष्ठान ।।
येथूनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ।।

असा उदात्त भाव झाला पाहिजे; तरच हा विशाल कर्मयोग सिद्धीस जाणार आहे. एरवी कोत्या दृष्टीच्या व हलक्या वृत्तीच्या माणसांनी कितीही ओरड केली किंवा आपल्याच केवळ बुद्धिसामर्थ्यावर उद्दामपणे अवलंबून राहणा-या शूर पण श्रद्धाशून्य पुरुषांनी, किंवा ज्यांच्या अंतःकरणात आशेचा जिवंत झरा वाहत नसून बाहेरून येणा-या असंख्य विघ्नांना एकाद्या पर्वताप्रमाणे जे पाठ देऊन आहेत, अशा धीर वीरांनी किती जरी बाह्य प्रयत्न केले, तरी ह्या महाराष्ट्राची उभारणी होणे दुरापस्त आहे. देशभक्त होणारांनी देवभक्तच आधी झाले पाहिजे—नव्हे असले पाहिजे.

अशा प्रकारची देशसेवा आमच्या देशपतीलाही मान्य आहे व व्हावयाला पाहिजे. ती न करिता आम्ही जर नुसते आमच्या युवराजासमोर तेलवातीचे दिवे ओवाळिले, तर ही एक अत्यंत ग्राम्य मूर्तिपूजाच होणार आहे. धार्मिक मूर्तिपूजेने आमचे झाले आहे तितके नुकसान पूरे आहे. त्यात राजकीय मूर्तिपूजेची भर घालावयास नको. ह्या प्रकारे आम्ही सर्व भारतवासी एक होऊन एकमनाने, एकदिलाने आणि अनन्य भावाने युवराजास सामोरे जाऊन त्याचे स्वागत करू आणि म्हणू की, हे आर्यपुत्र, तू ईश्वराने पाठविलेला आमचा नायक आहेस; आमचा भूदेव आहेस; तुझ्या छत्राखाली आम्ही सर्व एक झालो आहो; ही आमची एकी तू राख आणि पुढील दैवी कार्यात तूच आमचे नायकत्व पत्कर. चिरायू हो, चिरस्मरणीय हो, तू ज्या सर्व कर्माध्यक्ष ईश्वराचा ऐहिक प्रतिनिधी आहेस त्याचा जयजयकार असो ! तरच ह्या आमच्या स्वामीचे खरे स्वागत. नाही तर केवळ अंधपरंपरा अथवा जुलमाचा रामराम !

देवाचा व आपला संबंध

(रा. रा. नारायणराव पंडित यांच्या घरीं एका कौटुंबिक उपासनेच्या वेळीं झालेल्या उपदेशाचें साधारण स्वरूप.)

आपल्याला व्यवहारामध्यें नित्य असा अनुभव येतो कीं पुष्कळांचा व देवाचा संबंध साधारणपणे दोन प्रकारचा असतो. हे दोन्ही संबंध उदाहरणाने चांगल्या रीतीने दाखविता येतील म्हणून केवळ उदाहरणासाठीच मी असे म्हणतो की, परमेश्वराचा व मनुष्याचा संबंध साधारणपणे एकादी तरूण स्त्री व तरूण पुरूष ह्यांच्या संबंधासारखा असतो. एवढे म्हटल्याने आपल्याला माझ्या विचारांची काहीच कल्पना होणे नाही. म्हणून थोडे अधिक स्पष्टीकरण करितो. आमच्या स्त्रिया जात्याच लाजाळू असतात, त्यांच्यात जो विनय असतो, जो लाजाळूपणा असतो, त्याचा अतिरेक न झाला तर तो त्यांस फारच शोभतो. विनयाचा, लाजाळूपणाचा अतिरेक म्हणजे कोणाच्या वा-यास केव्हाच उभे न राहणे व कोणी कितीही सदबुद्धीने, कितीही चांगल्या रीतीने काहीही विचारिले तरी त्याचे उत्तर न देता दूर उभे राहणे किंवा दूर निघून जाणे. विनयाच्या ह्या अतिरेकाशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आमच्या स्त्रियांमध्ये सर्वसाधारण सा जो विनय आढळून येतो तो हा की, पर पुरूषाशी अगदी सरळ असे दोन शब्द बोलण्यासही लज्जा वाटावयाची. त्याचा व आपला काही संबंध नाही, ओळख नाही, परिचय नाही, तो आपणांस अगदीच परका म्हणून त्याच्याशी एक अक्षरही बोलावयचे नाही, ही एक स्थिती. ह्या स्थितीचे कारण परिचयाचा अभाव. दुसरी जी स्थिती तिचे कारण अति परिचय. स्त्री-पुरूषाचा अशा संबंध की स्त्रीला पुरूषाच्या बद्दल काही आदर नाही, त्याच्याविषयी काही पूज्यभाव नाही. त्याच्याशी वाटेल त्या वल्गना करण्यास काही वाटत नाही. त्याचा पाणउतारा करण्यात आपल्या हातून काही अनुचित कार्य घडत आहे ह्याची जागृती नाही. त्याला आपली उत्तरे टोचतील ह्याची पर्वा नाही. हा संबंध आपण अत्यंत त्याज्य असे समजतो, हे ठीकच आहे, परंतु असा संबंध आपल्या लक्षात कधी कधी येऊन चुकतो ह्यात काही संशय नाही. खरे पाहता ह्या दोन अपूर्ण संबंधांहून निराळा एक तिसरा पूर्ण संबंध आहे. स्त्री व पुरूष ह्यांचा संबंध एक तर पहिल्या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अपरिचयाचा किंवा दुस-या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अतिपरिचयाचा असाच सला पाहिजे असे नाही. त्यांच्यात तिसरा एक पूर्ण परिचयाचा दैवी संबंध असू शकतो. त्याच्या योगे परस्परांस परस्परांची योग्यता कळून चुकते. कोण कोणाहून श्रेष्ठ आहे, कोणामध्ये कोणते गुण अधिक आहेत, त्याची छाप कोणावर कशी पडते हे जाणणारा, एक दुस-यावर निर्मळ प्रेम करणारा, पण आदराने वागणारा असा तो संबंध असतो. असा संबंध जडला म्हणजे तेथे प्रेमाचे सारखे वर्धन होत असते. विचारास विचार जुळतात. आणि तो संबंध केवळ स्वर्गीय संबंध होय. असा संबंध असणा-या व्यक्ती मग पतिपत्नी असोत किंवा मित्रमित्र असोत.

आता जे आम्ही आपल्याला प्रार्थनासमाजाचे म्हणून म्हणवितो त्या आम्हांमध्ये पहिल्या दोन्ही उदारणांत दाखविलेली स्थिती नसली पाहिजे. ती आमच्यात न यावी म्हणून आम्ही फार जपले पाहिजे. पण ह्या दोन्ही प्रकारचा आम्हांस केव्हाच अनुभव येत नाही असे आपल्याला म्हणता यावयाचे नाही. देव अत्यंत करणाघन, दयाघन, मग त्याच्या जवळ जावयास आम्हांला लाज का वाटावी? आमचे मन का कचरावे? पण, प्रार्थना करा असे म्हटले असता टाळाटाळी करणारे व उघडपणे नाही म्हणणारे तरूण व प्रौढ आपल्याला आढळत असतील, मला आढळलेही आहेत व नित्य आढळतात. प्रार्थना करण्यास केव्हाही तयार न होणे म्हणजे काय तर देवापुढे जाण्यास लाजणे होय. माझा व ह्या मनुष्याचा काही परिचय नाही, त्याचे नाव फार तर मी इतरांच्या तोंडून ऐकलेले. त्याच्यापाशी मी काय बोलू? त्यास मी काय विचारू? हा भाव जसा त्या तरूणीत आढळून येतो व ती त्या माणसाच्या वा-यास उभी राहत नाही, त्यास टाळते, त्याचप्रमामे आमचे कित्येक तरूण करीत असतात. देव प्रेमाचे भातुके हाती घेऊन प्रेमाने आम्हांला पाचारीत असता आम्ही त्याला पाठमोरे होतो, त्याच्या अंकी बसून त्याच्या प्रेमाचा लाभ घेण्यास आम्ही धजत नाही. हा असला संबंध आम्ही टाळला पाहिजे. देवापाशी जाण्यास आम्ही लाजणे म्हणजे आम्ही आमच्या हानीस कारण होणे होय हे लक्षात ठेविले पाहिजे.

परंतु देवाशी अतिपरिचय होणे म्हणजे काय ते कदाचित तत्क्षणी आपल्या लक्षात यावयाचे नाही. कारण देवशी आमचा परिचय घडावयाची जेथे मारामार तेथे अतिपरिचय होऊन पुढे अवज्ञा कशी होणार? होय, आमचा देवाशी अतिपरिचय होतो आणि त्यामुळे त्याची आम्ही अवज्ञाही करतो, त्याचा व आमचा काय संबंध आहे हे अगदी विसरतो. त्याची योग्यता विसरतो व त्यास आम्ही केवळ निर्जीवाहून निर्जीव दुर्बळाहून दुर्बळ असा करून टाकितो आणि हे केवळ संवयीच्या जोरावर आम्ही करीत असतो. कल्पना करा की एकाद्या माणसाला रोज प्रार्थना करण्याची, भजन करण्याची सवय आहे असा मनुष्य त्याच्या मनाची तयारी नसली, मन अत्यंत मलिन, पापविचारानी भरलेले असे जरी असले तरी देवापाशी जाऊन त्याची स्तुती, त्याची प्रार्थना करण्यास, त्याचा म्हणवून घेण्यास मागेपुढे पहात नाही आपले कुटिल विचार सर्वज्ञ देव जाणून आहे, आपले अशुद्ध अंत:करण त्यास चांगले दिसत आहे, आपला वरपांगी व बेगडी भक्तिभाव त्यास केव्हाच कळून चुकलेला आहे हे तो विसरतो, व सात्विक भक्तिभावाचा आव आणून आपणा स्वत:स फसवून घेतो. अशा वेळी सर्वज्ञ, सर्वसमर्थ, जो देव त्यास मूढाहून मूढ, दुबळ्याहून दुबळा तो करून टाकतो नाही तर काय? हा मनुष्य आधी किती तरी दुबळा आणि मलिन, पण ती मलिन स्थिती देवाला न कळण्यासाठी वर बेमुर्वतीचे वर्तन असे मी समजतो. आम्ही प्रार्थनासमाजिक, जे आम्ही वारंवार प्रार्थना व भजन करणारे त्यांच्यात हा दांभिक भाव शिरण्याचा संभव आहे. म्हणून आम्ही त्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवावर आमचे प्रेम पाहिजे. पण, त्याच्यासंबंधाने आमच्या ठिकाणी आदरभाव पाहिजे, भीतीही पाहिजे. एकादे चांगल्या वळणातील मूल पहा, त्याचे आपल्या आईवर प्रेम नसते काय? बापावरही प्रेम असते. ते मूल आईबापाशी फार सलोख्याने वागते. पण, त्याच्या संबंधाने त्याचे ठिकाणी किती आदर, त्यांचा त्यास किती वचक असतो. तेच लाडाने बिघडलेले किंवा इतर वाईट मुलांच्या सहवासाने उद्दाम बनलेले मूल घ्या. त्यास आपल्या आईबापासंबंधाने काही क्षिती वाटत नाही. त्यांच्या समोर ते वाटेल ती ढोंगे करील, खोटे बोलून वेळां मारून नेईल, सर्व काही करील. आमचा व देवाचा संबंध असा अवज्ञा करण्यापर्यंत केव्हाही येऊ नये. तो अनंत, आम्ही सान्ताहून सान्त, तो सर्वज्ञ, आम्ही आपणास अल्पज्ञ म्हणविणे म्हणजेही आम्ही आमच्या ज्ञानाची घमेंड दाखविणे होय. तो सर्वसमर्थ आणि आम्ही त्याचे प्रेमास अपात्र, तो न्यायी आणि आम्ही अन्यायाकडे सदा धावणारे असा त्याच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदभाव आहे. हा भेदभाव ओळखून, त्यास वचकून असले पाहिजे. त्याच्यापुढे जावयाचे तर अंत:करण शुद्ध करून, मलिन भाव शुद्ध करून आम्ही गेले पाहिजे. निदान अंत:करण मलिन आहे हे त्याजपाशी अनुतापपूर्वक कबूल तरी केले पाहिजे. त्या मलिन स्थितीवर जाणूनबुजून आवरण घालण्याचा तरी प्रयत्न होतां कामा नये.

दान आणि ऋण

(रविवार ता. २१ ऑगस्ट १९१० रोजी केलेल्या उपदेशाचा सारांश.)

आज आमच्या ब्राह्मसमाजाचे एक प्रसारक भाई बलदेव नारायण हे परलोकवासी होऊन सहा वर्षे झाली. हे इराणात प्रचारासाठी गेले असता बगदाद येथे अकस्मात पटकीचा उपद्रव होऊन तेथील तुर्की इस्लाम हॉस्पिटलमध्ये ता. २१ ऑगस्ट सन १९०४ रोजी मरण पावले. ह्यांच्याविषयीचा एक लहानसा सुंदर चरित्रात्मक ग्रंथ कुचबिहारी येथील बाबू गौरीप्रसाद मुजुमदार ह्यांनी नुकताच प्रसिद्ध केला आहे. भाई बलदेव हे आमच्या समाजाच्या नामांकित आणि पुढारी प्रचारकांपैकी एक होते असे नाही, किंबहुना हिंदुस्थानातील कित्येक ब्राह्मांना ह्यांचे नावही माहीत नसेल, तथापि ब्राह्मसमाजामध्ये प्रचारकपणाला जे दोन अत्यावश्यक गुण, म्हणजे स्वतःविषयीच्या वासनांचा पूर्ण संन्यास आणि समाजसेवेविषयी आतुरता हे त्यांच्या अंगी पूर्णपणे वसत होते. भाई बलदेव बहारप्रांती जन्मले. लौकिकात कुलीन शब्दाचा जो अर्थ होतो त्या अर्थाने ह्यांचा जन्म मुळीच कुलीन नव्हता. पण ऋषींचे कुल कधीच पहात बसू नये. धर्म आणि नीती ह्यांची लागवड कडधान्याप्रमाणे केवळ वंशपरंपरेने होत नसते. ह्यांच्या बीजांची वाढ होण्याला भूमीचे सर्वतोपरी अवलंब नको आहे. केवळ नैसर्गिक नियमानुसार जन्मास आलेल्या विभूतीमध्ये सात्विक गुणांचा आणि तेजाचा कळस झाल्याची उदाहरणे उपनिषद काळापासून मुबलक मिळत आहेत. पुराणातही पूज्यपादारविंद विदुर आणि तत्प्रणीत नीती पुष्कळ सापडते. केवळ जातिकुलाभिमानाच्या बाह्य अवडंबराने मनुष्य जेव्हा डोईजड होतो, तेव्हा निसर्ग देव जणू काय आपला सात्विक सूड उगविण्यासाठी आणि धर्मनीतीची स्वतंत्रता स्थापण्यासाठी आपली विशेष अपत्ये निर्माण करून जगास देतो. बलदेव भाईही ह्याच कोटीतले होते. ते स्वतःजरी बहार प्रांतात जन्मले तरी त्यांना दक्षिणेतील मंगळूर येथील समाज इतका आवडला की, त्यांच्या मागे त्यांच्या झोळीत जी काही भिक्षा उरली ती सर्व मंगळूर ब्राह्मसमाजास त्यांनी अर्पण केली आणि तिचा व्यय कानडी भाषेतून ब्राह्मधर्मविषयक पुस्तकांचा प्रसार करण्याकडे व्हावा असे मृत्युपत्रात नमूद करून ठेवले. स्वतः संन्यासी होते तरी पंक्तिप्रपंच न करता सामाजिक मेळे आणि संमेलनेही ह्या भिक्षेतून व्हावीत असे बजावून ते इराणात प्रचारास गेले. आणि तेथेच त्यांनी आपली ऐहिक यात्रा संपविली. ह्याप्रमाणे वर्ण, आश्रम, प्रांत, देश, भाषा, जाती, कुल आणि धर्म ह्या कशाचीच बाधा ब्रह्मतत्त्वास होत नाही, हे त्यांनी आपला जन्म, जिणे, आणि मृत्यू ह्या तिहींच्या द्वारे दाखविले.

भाई बलदेव ह्यांनी समाजकार्यास आपल्या आयुष्याचे जे दान केले त्यात त्यांच्या मनाची एक विशिष्ट प्रकारची वृत्ती होती. तिच्यामुळे त्यांच्या कार्यात यश आले. तिचाच आपण विचार करू. आम्ही पुष्कळ वेळां आपापल्या परी लहानमोठी दाने करीत असतो. पण त्यांची सफलता दानाच्या विषयावर नसून दात्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. दान करताना आपण मोठा उपकार करतो, स्वतःचा त्याग करतो, इत्यादी भ्रामक कल्पनांस आपण बळी पडू नये, ते दान कितीही लहान असो, किंवा मोठे असो, खिशातून काढून टाकलेले एकादे नाणे असो, किंवा आपल्या एकंद आयुष्याचे समर्पण असो, ते करीत असताना आपल्याला असे वाटत असावे की केवळ आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड आपण करीत आहो. आपली सर्व दाने ही मागील ऋणांची फेड असते अशी आपली नित्य समजूत ठेवावी.

आमच्या हिंदू धर्मात ह्या ऋणानुबंधाविषयी चांगली मार्मिक आणि तात्त्विक फोड केलेली आहे :

यज्ञार्थात्कर्मणोsन्यत्र लोकोsयं कर्मबन्धनः ।
तदथै कर्म कौतेय मुक्तसंगः समाचर ।।
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोsस्त्विष्टकामधुक् ।।
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ ।।
इष्टान्भोगन्हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।।
तैर्दत्तानप्रवायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ।।
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्विषैः ।
भुंजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ।।
- भ. गी. अध्याय ३ श्लोक ९ ते १३

वरील श्लोकांचा अर्थ पुराणवादी काहीही करोत आणि प्रस्तुत रूढीमध्ये ह्यांचा प्रचार कसाही असो, आम्हांला वरील वचनाचा इत्यर्थ एवढाच दिसून येतो की, समाजाची वाढ आणि विकास म्हणजे त्यातील व्यक्तींनी परस्पर ऋणामध्ये गुरफटून जाणे हे होय. वरील श्लोकात सांगितलेले देव दूरस्थ आकाशात नसून ते समाजाचेच लहानमोठे घटकावयव असतात. त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती सुस्पष्ट जरी दिसत नाही तरी त्यांच्यामधील परस्पर देवघेवीवर समाजाची सरणी अवलंबून असते. ह्या निराकार समाजदैवतांची संभावना करून आपली शक्त्यनुसार ऋणमुक्तता करून घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, आणि त्या कर्तव्यास जो चुकतो तो ‘स्नेत एव सः’ ह्या वचनाप्रमाणे चोर ठरतो. यद्यपि पिनल कोडाप्रमाणे चोरीची त्याजवर शाबिती झाली नाही तरी त्याहून वरिष्ठ कोडाबरहुकूम त्यावर शाबिती होतेच. हे जे परस्पर ऋणानुबंधनाचे चक्र प्रवर्तित झाले आहे, त्याचे अनुवर्तन जो कोणी करीत नाही त्याचे आयुष्य व्यर्थ असे सोळाव्या श्लोकात सांगितले आहे. म्हणून आम्ही दान करावे इतकेच नव्हे तर ते करीत असताना आम्ही जगावर मोठा उपकार करतो अशी आढ्यतेची भावना न ठेवता मागील ज्ञात किंवा अज्ञात ऋणाची केवळ फेड करतो अशी नम्र भाविक बुद्धी राखली पाहिजे. म्हणूनच उपनिषदे म्हणतात :

“श्रद्धया देयं ।। अश्रद्धयाsदेयं ।। श्रिया देयं ।।
र्हिया देयं ।। मिया देयं ।। संविदा देयं ।।”
- तैतिरीयोपनिषद् ११-३

दान करीत असताना आपल्या मनामध्ये अशी श्रद्धा असावी की, ह्याचा परिणाम चांगला होईलच होईल. आपण देतो ह्याची आपणास पावती मिळेल की नाही, पुकारा होईल की नाही, परिणाम घडेल की नाही, अशा प्रकारच्या अश्रद्धेने दान करू नये. इतकेच नव्हे तर देत असताना आपणास लज्जा वाटावी. हे ऋण आपल्या हातून आतापर्यंत फिटले नाही, तेव्हा आता ह्याचा स्वीकार होईल की नाही म्हणून उलट आपला हात भीतीने कापावा. तसेच आपल्या अंतःकरणात कधीही तळमळ असू नये की, हे आपण देतो ते न देता आपल्याजवळ राहिले तर आपल्या बायकामुलांना संतोष होईल. उलट आपल्या बायकामुलांप्रमाणेच दुस-यास जो संतोष होईल, त्याच्या सहानुभूतीच्या आनंदाने द्यावे, हे स्पष्ट करण्यासाठी “संविदा देय” असे म्हटले आहे. असे न करता आपण मेहेरबाणी करण्याच्या बुद्धीने देऊ लागले तर आपली निराशा होते. केव्हा केव्हा तर ह्याहून दानाचा अधम प्रकार असा घडतो की दान देत असताना आपण दुस-यास ऋणच देतो असे समजून त्याची फेड आपल्यास कधीतरी होईल अशी दुराशा आपल्याला लागलेली असते. अशा रीतीने ऋण देणे म्हणजे आपला सत्यानाश करून घेणे होय. पश्चिम आफ्रिकेतील निग्रो लोकांत प्रचलित असलेल्या भाकड कथांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे, त्यात ह्या संबंधाची एक मार्मिक गोष्ट आहे ती अशी :-

एकदा एका लबाड मनुष्याने आपल्या मित्राजवळ २०० काठ्या उसन्या मागितल्या आणि पुढच्या बाजारी परत करीन असे सांगितले. मात्र त्या दिवशी सकाळी येताना बरोबर भरलेली बंदूक आणावी आणि आपली वाट पहात घरी येऊन बसावे असे बजाविले. लगेच त्या लबाड मनुष्याने आपल्या मित्रमंडळींपैकी एक चित्ता, एक बोकड, एक रानमांजर आणि एक कोंबडा ह्यांच्यापासूनही वरील प्रकारचा करार करून दोन-दोनशे काठ्या उसन्या आणल्या. (काठी हे एक प्रकारचे जंगली नाणे दिसते). बाजाराच्या दिवशी हा लबाड मनुष्य आपल्या बसावयाच्या खोलीत मूठभर दाणे पसरून आपण आतल्या खोलीत दार लावून दडून बसला. ठरल्याप्रमाणे प्रथम कोंबडा जो अर्थात लवकर उठणारा प्राणी तो आला आणि भूक लागल्यामुळे जमिनीवर पडलेले दाणे सहजच वेचून खाऊ लागला. मागून रानमांजर आले. त्याने कोंबड्यास खाल्ले. इतक्यात बोकड आला, त्याने रानमांजरास हुसकावून लावले, इतक्यात चित्ता आला. त्याने बोकडाची न्याहारी केली. मागाहून भरलेली बंदूक घेऊन माणूस आला, आणि स्वसंरक्षणार्थ त्याने चित्त्यावर बंदूक झाडली. आवाज ऐकल्या बरोबर दडून बसलेला तो लबाड मनुष्य बाहेर येऊन आपला मित्र चित्ता ह्याचा खून करणा-याला तो धमकी देऊ लागला. शेवटी आणखी दोनशे काठ्या जास्ती देऊन त्या लबाड मनुष्यापासून त्याने आपली कशीबशी सुटका करून घेतली. तात्पर्य हे की, अशा रीतीने ऋण न देता शक्त्यनुसार प्रत्येकाने दानच केले असते तर आपत्ती टळली असती. ह्याप्रमाणे आम्हीही दान करतेवेळी मनात नीच हेतू धारण केल्यास आमचाही यद्यपि शारीरिक नसल्यास आध्यात्मिक नाश होतोच.

केव्हा केव्हा गोष्टीप्रमाणे म्हणीमध्येही मर्म असते. कानडी भाषेत एक म्हण आहे की, “प्रेतावर केलेला शृंगार नव्हे आणि गावावर केलेला उपकार नव्हे.” सार्वजनिक कल्याणाची चर्चा चालू असलेल्या आधुनिक काळात पुष्कळदा आमची अशी समजूत होऊन चुकते की, गावावरील उपकार, हा सर्वांत मोठा उपकार पण वस्तुतः आध्यात्मिक दृष्टीने पाहू गेल्यास कोणतेही दान लहान असो किंवा मोठे असो, एका व्यक्तीस असो किंवा सर्व जगतास असो, ते नुसती मागील ऋणाची फेड ह्या बुद्धीने करणे उचित आहे. आमचे परलोकवासी भाई बलदेव ह्यांनी नवविद्या भक्तीतील शेवटची भक्ती जी आत्मसमर्पण ती आचरीत असताना आमरण मनाची अशी उन्नत भावना ठेविली की, आपण जे जे करतो ते ते मागील उपकाराची फेड करण्यासाठीच करतो.

माझा सर्व भाव तुमचिया पायी ।
झालो उतराई देवराया ।।
- तुकाराम

डॉ. भांडारकरांस मानपत्र

(सु. प. ५-२-१९०५)
(गु. डॉ. भांडारकरांना मुंबई युनिव्हर्सिटीची एल्. एल्. डी. ही पदवी मिळाली, त्या वेळीं त्यांचें अभिनंदन करण्याकरितां जी सभा भरविली होती त्या सभेमध्यें झालेल्या भाषणाचा सारांश.)

आजच्या प्रसंगी मी माझ्या मनाच्या कलाप्रमाणेच वागावयाचे झाल्यास मी मुळीच बोलावयास उठलो नसतो. कारण आम्हा पौरस्त्यांमध्ये मर्यादेचे व विनयाचे जे नियम आहेत, त्याप्रमाणे एकाने दुस-याचा आणि विशेषेकरून लहानांनी वडिलांचा बहुमान करावयाचा झाल्यास तो शब्दांनी व्यक्त करू नये, तर वर्तनानेच दाखवावा असे आहे. एकाद्यास कोणी म्हटले की, तुझ्या आईवर तुझी प्रीती आहे, हे शब्दांनी सिद्ध कर किंवा पित्यासंबंधी तुझी पूज्यबुद्धी असल्याचे आम्हांस उघड प्रत्ययास आणून दे, तर त्याला काय वाटेल ? त्याचप्रकारे, आज मला प्रत्यक्ष आमच्या गुरुवर्यांचे पुढे उभे राहून त्यांचेविषयी आम्हांला असे वाटते, तसे वाटते इ. म्हणावे लागत आहे. ह्यात एका दृष्टीने मजवर मोठा जुलूम होत आहे. पण असो. ज्याअर्थी, मी त्यास वश झालो आहे त्याअर्थी मला आपले काम बजावले पाहिजे.

प्रथम कोणी अशी शंका घेतील की, डॉ. साहेबांस हा अपूर्व मान मिळून आज किती दिवस तरी झाले आणि ही समाजातील तरुण मंडळी त्यांच्या अभिनंदनास अगदी सर्वांच्या मागून अशी रेंगाळत का आली आहे ? पण खरा प्रकार असा आहे की, जरी ह्या मंडळीने सर्वांच्या मागून अभिनंदन उघड रीतीने केले आहे, तरी ते करण्याचा विचार ह्यांच्या मनात सर्वांच्या आधी आला आहे. मला पक्के आठवते की, डॉ. साहेबांस ही पदवी मिळाल्याबरोबर लगेच एक सामाजिक तरुण मजकडे आला आणि विचारू लागला, की आता आम्ही काय करावयाचे ? आम्हांस तर फारच आनंद होत आहे. मी तेव्हा इतकेच म्हणालो की, आम्ही तूर्त हेच करावयाचे की लोकांत कोण बडी बडी मंडळी आमच्या गुरुवर्यांचे कसकसे अभिनंदन करतील ते कौतुकाने पहावे. आणि खरोखर आमचा समाज म्हणजे एक कुटुंब. डॉ. साहेबांशी आमचे घरगुती नाते. तर बाहेर लोकांकडून अनेकवार सन्मान व अभिनंदन पाहून डॉ. साहेब अखेरीस घरी आले असता आम्ही घरातील लहान मंडळींनी त्यांचे असे उल्हासाने स्वागत करावे ह्यात काहीच वावगे नाही, तर ते यथायोग्यच झाले.

ह्या प्रसंगी मी डॉ. मजकुरांची मोघम स्तुती किंवा त्यांचे काही सामान्य गुण गात बसत नाही. आता जी फुलांची माळ आम्ही त्यांच्या गळ्यात घातली आहे, ती जशी ते थोडाच वेळ केवळ उपचारासाठी घेऊन शेवटी येथल्या येथेच ठेवून ते व आम्हीही निघून जाणार आहो, तशीच गत अशा स्तुतीच्या माळेची होईल. म्हणून डॉ. साहेबांचे एक दोन विशेष गुण जे अगदी माझ्या अनुभवासच आले ते मी सांगत आहे. आणि तेही आमच्या फायद्यासाठी, त्यांच्या बढाईसाठी नव्हे. समाजाचे गुणदोष समाजास सांगण्यात डॉ. साहेब अगदी निस्पृह आहेत हे तर आता बहुश्रुतच आहे, पण ह्याहूनही एका दृष्टीने दुर्लभ जो गुण खासगी व्यवहारातही आपले कर्तव्य बजावतेवेळी निर्भय व निर्भीडपणा ठेवणे, हा त्यांच्यात आहे. एका व्यक्तीसंबंधी आपले मत त्याच्या समक्ष अगदी सरळपणे व सात्त्विकपणे सांगून टाकण्यात ते मुळीच कसूर करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्या समागमात राहणा-या तरुणांस फार लाभ होण्यासारखा आहे. दुसरी विशेष गोष्ट मी पाहिलेली त्यांची नित्याची कौटुंबिक उपासना ही होय. स्वाशयनिवेदन व आत्मपरिक्षणांनी परिपूर्ण भरलेल्या त्यांच्या व्यक्तिप्रार्थना, आम्हांला पान उलटण्याचीही फुरसद न मिळता त्यांना समयोचित सुचणारे तुकोबांचे अभंग अगदी विनीत भावाने त्यांच्या भोवताली बसलेली त्यांची मुले, नातू व नाती व त्यांचे भजन हे सर्व पाहून परक्याचे मनावर देखील फार खोल व शुभ परिणाम होण्यासारखा आहे.

बंगाल्यातील महर्षी देवेंद्रनाथ हे आता परलोकवासी झाले. पण आमचे महर्षी आमच्यात अद्यापि आहेत ही किती भाग्याची गोष्ट ! हे महर्षीही त्याप्रमाणेच आमच्या समाजाचे प्रधान आचार्य आणि महनीय उपाध्याय आहेत. उपासना व उपदेश ह्याशिवाय कौटुंबिक विधिसंस्कार ह्यांनीच ग्रथित करून ठेविले आहेत. इतकेच नव्हे तर उपनयन, विवाह, नामकरण, आदिकरून घरगुती विधी ह्यांच्या हस्ते जितके झाले आहेत, तितके समाजात इतरांकडून झाले नसतील. शेवटी गुरुवर्यांजवळ एकच मागणी मागून मी रजा घेतो. आमच्या समाजाच्या मतासंबंधी एकाद्या वजनदार ग्रंथाची हल्ली मोठी उणीव आहे. बाह्य ग्रंथाचे प्रामाण्य समाज मानीत नाही, तेव्हा अशा ग्रंथास पुढे भलतेच महत्त्व येईल अशी भीती कोणास बाळगण्याचे कारण नाही. तर डॉ. साहेबांच्याच हस्ते असा ग्रंथ होईल तर आम्ही फार आभारी होऊ.

  1. डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
  2. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति
  3. जलप्रवास
  4. जनांतून वनांत आणि परत
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
Page 107 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी