1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची करुण कहाणी

पुण्यात आल्यानंतर आणि विशेषतः फिमेल हायस्कूलमधील अभ्यासक्रम पार पाडीत असता­ जनाबाईंना एका नवीन जीवनसरणीचा परिचय झाला. हुजूरपागा ही एक नमुनेदार मुलींची शाळा होती. हे फिमेल हायस्कूल हुजूरपागेच्या जागेत भरत असल्याने शाळेला हुजूरपागा असे नाव पडले. तेथील शिक्षिका आपले काम निष्ठेने करणा-या होत्या. मिस् हरफर्ड यांना मुलींनी सायंकाळच्या वेळी चकाट्या पिटीत बसण्याऐवजी बोर्डिंग समोरच्या जागेत निरनिराळे खेळ खेळावेत, त्यांना व्यायाम घडावा असे वाटत असे. कधी कधी त्याही खेळात भाग घेत असत. त्यांना जात्याच स्वच्छता, टापटीप, आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीची सभ्यता यांची आवड होती व मुलींनीही तसेच वागावे अशी त्यांची अपेक्षा असायची. जनाबाई ह्या इतर मुलींच्या मानाने वयाने प्रौढ असल्या तरी त्यांच्या ठिकाणी मनाचा मोठेपणा व खिलाडूवृत्ती होती. भिमा मोरे ही दिसावयास अत्यंत कुरूप परंतु बुद्धीने एकदम तल्लख होती. जनाक्काला खेळकर, चेष्टेखोर मुलींबद्दल कौतुक असायचे. गुलाब जव्हेरे, कृष्णाबाई केळवकर, यमुनाबाई केळवकर ह्या त्यांच्या इतर मैत्रिणी. पुढच्या आयुष्यात त्या भेटल्यानंतर भिमा मोरे विनोदी वृत्तीच्या आठवणी काढण्यात रंगून जात असत.

भिमा मोरेप्रमाणेच जनाबाईंना कौतुक वाटायचे ते सई जोशी नावाच्या मुलीबद्दल. ही सडपातळ बांध्याची, हुशार आणि चुणचुणीत अशी तेरा-चौदा वर्षांची परकर घालणारी मुलगी होती. हुजूरपागेच्या वसतिगृहात आपल्या आईसह राहून शिक्षण घेत होती. अमेरिकेला पहिल्या प्रथम गेलेल्या आनंदीबाई जोशी यांची ही पुतणी, (हीच पुढे प्रसिद्ध रॅंग्लर रघुनाथराव परांजपे यांची पत्नी झाली.). सई जोशी आपल्या कुशाग्र बुद्धीमुळे शाळेतील मुलींमध्ये आणि शिक्षिकांमध्ये प्रिय असे. सदानकदा खेळात रमलेली सई अभ्यासातही हुशार व पहिला नंबर न सोडणारी. भिमा मोरेप्रमाणेच ही पण थट्टेखोर स्वभावाची होती. एकदा तर मदरलाच एप्रिल फूल करण्याचा घाट तिने घातला व यशस्वीपणे पार पाडला. सईची खेळकर वृत्ती पुढेही टिकून राहिली. रॅंग्लर परांजपे यांच्याशी लग्न झाल्यानंतर जनाबाईंना त्यांनी आपल्या घरी एकदा निमंत्रित केले असता त्यांच्या तोंडून अप्पा हे नाव येऊ लागले. जनाबाईंनी हे अप्पा कोण? असे सईंना विचारताच “अप्पा होय, अप्पा माझे मित्र आहेत” असे खोडकरपणे उत्तर दिले आणि म्हटलं, “अप्पा, थोडं आत या बघू.” आणि आत आले ते खुद्द रघुनाथरावच होते. हुजूरपागेतील शिक्षण घेण्याच्या काळात जनाबाईंच्या वृत्तीचा मोकळेपणा, आनंदीपणा, खिलाडूपणा प्रकट होत होता. त्याचप्रमाणे जनाबाईंच्या ठिकाणी दुसरी एक गंभीर वृत्ती होती ती व्यापक सहानुभवाची; निरपेक्ष सेवावृत्तीची आणि जबाबदारीची. जनाबाईंच्या आयुष्यात केवळ करुणरसाची मूर्ती अशी एक व्यक्ती आली ती म्हणजे शांता सुखटणकर. तिच्या अनुषंगाने जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा गंभीर पैलू हृदयंगमपणे प्रकट होताना दिसतो.

विठ्ठलरावांच्या मित्रवर्गापैकी कोल्हापूरचे श्री. वासुदेव अनंत सुखटणकर हे एक होते. हे मूळचे कोल्हापूरचे. विठ्ठलराव इंटरमीजिएटच्या वर्गात असताना त्यांची भेट झाली. त्यांच्या सालस स्वभावामुळे विठ्ठलरावांची व त्यांची लगेच मैत्री जुळली. त्यांच्याही घरची अत्यंत गरिबी. १८९८ मध्ये अण्णांनी जनाबाईंना घेऊन मित्रवर्गासमवेत कोल्हापूर, पन्हाळा, विशाळगड अशी सहल केली. विशाळगडास जाताना वासुदेवरांच्या आग्रहास्तव पन्हाळ्यात त्यांच्या बहिणीच्या घरी १-२ दिवस मुक्काम केला. वासु्देवरावांची आई सुंदराबाई ही त्याचवेळी मुलीच्या बाळंतपणासाठी तिथे आली होती. सकाळच्या वेळी वेणीफणी करण्यासाठी एका अडगळीवजा खोलीत जनाबाई गेल्या असता कोप-यात एक वळकटी पडल्याचे त्यांना दिसले. पण त्या वळकटीत हालचाल दिसली व क्षीण आवाजात कोणीतरी कण्हल्याचा आवाज त्यांनी ऐकला. इतक्यात सुंदराबाई पेजेची वाटी घेऊन खोलीत आल्या आणि त्यांच्याकडून खुलासा झाला. ही आजारी मुलगी म्हणजे सुखटणकरांची ११-१२ वर्षांची बहीण शांता. नवज्वराच्या आजारातून ती मरता मरता वाचली आणि पक्षाघाताच्या विकाराने तिच्यावर झडप घातली. पक्षाघाताने तिचे सारे अंग लटलटत होते. मान ठरत नव्हती म्हणून मान धरून आईला पेज भरवावी लागत होती. ती उठणे-बसणे करू शकत नव्हती. डोक्याचे केस  पार गेले होते. तोंडावरून वारे गेल्यामुळे बोलणे नीटसे उमजत नव्हते. असे असूनही मुलगी नाजूक बांध्याची, रेखीव जिवणीची, गौरवर्णाची आणि दहाजणीत उठून दिसणारी आहे असे जनाबाईंना वाटले, तिला ह्या द्यनीय अवस्थेत बघितल्यावर ह्या पोरीचं पुढं कसं होईल, ह्या विचाराने जनाबाईंचे मन ग्रासून गेले. तिच्याबद्दल अंतःकरणात कळवळा उत्पन्न झाला. शांताचे जनाबाईला झालेले हे पहिले दर्शन.

त्यानंतर दोन वर्षांनी १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात जनाबाईंनी तिला पाहिले ते स्वतःच्याच घरी जमखंडीस. वासुदेव सुखटणकर सारस्वत जातीचे. त्यांचे वडील एकाएकी वारले. रूढीला अनुसरून आईचे केशवपन करावे असे नातलगांनी ठरविले होते. परंतु विठ्ठलरावांप्रमाणेच वासुदेवरावही सुधारणेचे कट्टे पुरस्कर्ते असल्यामुळे आईच्या केशवपनास त्यांनी हरकत घेतली. आईचे मन वळवून तीस केशवपनापासून परावृत्त केले. तरीदेखील गावात राहून लोकनिंदेचा मारा सहन करण्यापेक्षा अन्यत्र थोडे दिवस राहावे या विचाराने विठ्ठलरावांच्या संमतीने त्यांच्या जमखंडीतील घरातच आपली आई, शांता व धाकटा भाऊ राजाराम अशा त्रिवर्गास ठेवले होते. १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात बाबा फार आजारी असल्यामुळे विठ्ठलरावांसमवेत जनाबाई जमखंडीला आल्यावर आपल्याच घरात जनाबाईंनी दुस-यांदा शांताला पाहिले. लुगडे कसेबसे गुंडाळून घेतलेले. नीट चालता, उभे राहता येत नसे. जीभ जड असल्याने बोलणे अडखळतच. प्रतापच्या पाळण्याची दोरी ओढताना पाळण्याअगोदर तिचे हातच लटलटा कापत असत. फार वेळ उभे राहता येत नव्हते. केव्हा मटकन खाली बसेल याचा नेम नसायचा. तिचे तोंड धुणे, हात घासणे, अंग धुणे ही सारी कामे तिच्या आईलाच करावी लागत असत.

सुंदराबाई ह्या कर्त्यासवरत्या सुशिक्षित मुलाचा आग्रह म्हणून सोवळ्या झाल्या नव्हत्या. तरी पण ती गोष्ट त्यांच्या मनाला बरीच लागून राहिली असावी. त्या आतल्या आत कुढत असाव्यात. उपासतापासाच्या सबबीखाली स्वतःच्या प्रकृतीची बुध्याच हेळसांड करून इहलोकीचे आपले आयुष्य शक्य तितक्या लवकर संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता, अशीच जनाबाईंची कल्पना झाली. नवरा वारलेली, घरची अत्यंत गरिबी. केवळ नाइलाज म्हणून सहा-सात महिन्यांसाठी आपण दुस-याकडे राहत आहोत ही जाणीव ठेवून त्यांचे सर्वांशी वागणे असे. १९०१ साली विठ्ठलराव विलायतेस शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचे मित्र गोविंदराव सासने आणि वासुदेवराव सुखटणकर हे जनबाईंच्या शाळेत अधूनमधून येत व विचारपूस करून जात असेच, एकदा आले असता वासुदेवरावांनी आपल्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी जनाबाईंस सांगितली. जनाबाईंना त्यांच्या आईच्या निधनापेक्षा शांताच्या पुढील असाध्य, परावलंबी, लाजिरवाण्या जीवनाची भयानकताच अधिक जाणवू लागली. थोड्याच दिवसांनी वासुदेवरावांची गाठ पडताच शांतेला हुजूरपागेत ठेवावे असे त्यांनी वासुदेवरावांस सुचविले. डॉ. भांडारकरांचा परिचय असल्यामुळे व शाळेचे तेच अध्वर्यू असल्यामुळे ते शक्य होईल, असाही निर्वाळा त्यांनी दिला आणि शांतेची जबाबदारी कोण घेणार, ह्या प्रश्नाला जनाबाईंनी निर्धाराने उत्तर दिले, “शांतेला हुजूपागेत राहण्याची परवानगी मिळाली तर तिची सारी जबाबदारी माझ्याकडे लागली. मग तुम्ही चिंता सोडा. असं समजा, मीच तिची आई.” डॉ. भांडारकरांनी परवानगी दिली. लेडिज सुपरिटेंडेंट मिस सोराबजी यांना होकार देणे प्राप्त झाले आणि अशा रीतीने शांता जनाबाईंजवळ वसतिगृहात आली.

खरे तर जनाबाई स्वतःच दुःखमय अशा परिस्थितीत होत्या. परंतु त्यांना शांतेचे जीवन किती कष्टात, दुःखपूर्ण, परावलंबी व लाजिरवाणे आहे हे जाणवून ही मुलगी आपल्यापेक्षाही दुर्दैवी आहे, असे वाटत होते. जनाक्काचे मन शांतेबद्दल करूणेने अपरंपार भरून आले. शांतेचा सांभाळ करण्याचा जनाबाईंचा विचार कोणालाही फारसा पसंत पडला नव्हता. मिस् सोराबजींना तर त्यांच्याबद्दल काहीसा रागच आला होता. खुद्द आई-बाबांनाही जनाबाईंचे करणे पसंत नव्हते.  मैत्रिणींनी तर त्यांना मूर्खातच काढले. परंतु शांतेची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी, तिची सेवाशुश्रूषा करावी असा पक्का निर्धार जनाबाईंनी केला होता.

शांताच्या हातापायाच्या दुर्बळ स्नायूंना कामाचा सराव जितका होईल तेवढा लाभदायक ठरेल असे डॉक्टरांचे मत होते. प्रथम प्रथम जनाबाई  तिचे तोंड धुण्यापासून सगळी कामे करीत असत. वेळ मिळेल  तेव्हा शांताच्या हाताला धरून बागेत हिंडावे, तिला घेऊन जात्यावर दळत बसावे, मुसळ हातात घेऊन मसाला वगैरे कुटत बसावे ही कामे करण्याचा उपक्रम क्रमशः चालू ठेवला. थोड्या दिवसांतच तिच्यात सुधारणा दिसू लागल्यावर जनबाईंचा उत्साह दुप्पट झाला. आंघोळीच्या वेळेस सर्वांगास तेल लावून चोळणे, रात्री तिच्या हाताच्या बोटांना तेलाने चोळणे इत्यादी कामे जनाबाई करीत असत. आधी पंगतीमध्ये लहान मुलाप्रमाणे घास भरवावा लागे. थोड्याच दिवसांमध्ये श्रमाचे चीज झाल्याचे दिसून येऊ लागले. शांताच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा दिसू लागली. ती आपली कामे स्वतःच करू लागली. न अडखळता चालू लागली. पुढे पुढे तर ती इतकी सुधारली की आपल्या हुशारीने वर्गातल्या परीक्षेत तिने बराच वरचा क्रमांक पटकावला. शांता अभ्यासातच नव्हे तर इतर अनेक बाबतीत एकसारखी प्रगती करू लागली. अक्षर तर ती इतके वळणदार व सुंदर काढी की त्याचा नमुना म्हणून वर्गशिक्षक इतर मुलींपुढे ठेवत असत. शिवाय कामातही तिची प्रगती प्रशंसनीय होती. सा-या शाळेत तिचा बोलबाला झाला. लेडिज सुपरिटेंडेंट मिस् सोराबजींना शांता म्हणजे आपल्या शाळेचे भूषणच वाटे. जे प्रतिष्ठित व सन्मान्य गृहस्थ शाळा पाहण्यास येत, त्यांच्यापुढे शांताला उभी करून “पक्षाघाताच्या विकाराने शारीरिक दुर्बलता पावलेल्या मुलीने आपल्या हिमतीवर मोठ्या प्रयासाने अभ्यासात, शिक्षणक्रमात, चित्रकलेत अनपेक्षित प्रगती केलेली असून तिच्या प्रगतीचे सारे श्रेय ह्या मुलीकडे आहे,” असे म्हणून जनाबाईंनाही शांताच्या बरोबर सर्वांस दाखविले जाई. एकदा बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी शाळेस भेट दिली असता लेडिज सुपरिटेंडेंटनी शांताबरोबर जनाबाईंचीही नेहमीप्रमाणे माहिती करून दिली आणि म्हटले की, “या मुलीचा भाऊ नुकताच धर्माभ्यासाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी विलायतेस रवाना झाला आहे.” ते ऐकताच महाराज कौतुकाने जनाबाईंकडे पाहू लागले. कारण विठ्ठल रामजींना कॉलेजच्या शिक्षणासाठी, त्याचप्रमाणेच विलायतेस जाण्याच्या खर्चासाठी आधार दिला होता तो सयाजीराव महाराजांनीच. शांता ही जनाबाईंच्या सेवाशुश्रूषेमुळेच आजारातून उठून माणसात आली हे सयाजीरावांना कळल्यावर फार आनंद झाला. ‘आपण ज्या होतकरू विद्या्र्थ्यास इंग्लंडला पाठविण्यास आर्थिक साहाय्य दिले त्याची बहीणदेखील लोकोपयोगी कृत्य करण्यात तत्पर आहे तर’, असे कौतुकाचे आणि गौरवाचे उद्गार त्यांनी लेडिज सुपरिटेंडेंटजवळ काढले आणि मोठ्या कुतूहलपूर्वक जनाबाईंची तर विचारपूस केलीच, शिवाय आई, बाप, भाऊ कसे आहेत याचीही महाराजांनी आत्मीयतेने चौकशी केली.१ शांतेची आपण घेतलेली जबाबदारी समाधानकारकपणे आपल्या हातून पार पडली याचा जनाबाईंना अधिक आनंद होत होता. शांताची सेवाशुश्रूषा करण्याची ऊर्मी हा जनाबाईंच्या सेवाभावी वृत्तीचा, उदात्त अशा माणुसकीचाच आविष्कार होता आणि काही वर्षानंतर विठ्ठल रामजींनी स्थापन केलेल्या ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ च्या अंतर्गत असलेल्या निराश्रित सेवासदनाची जबाबदारी जनाबाईंनी आपल्या शिरावर घेतली व ती मोठ्या सेवाभावाने पार पाडली. याचा पूर्वपाठच एक प्रकारे शांताची त्यांनी केलेली जी शुश्रूषा आहे त्यामध्ये पाहावयास मिळतो. पुणे येथील वास्तव्यात विठ्ठल रामजींच्या व्यक्तिमत्त्वाची घडण काही एका प्रमाणात होत होती तशीच जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची घडणही पुण्यामध्ये होत होती व त्याचाच एक पैलू म्हणून त्यांच्या सेवावृत्तीचा आविष्कार शांता सुखटणकरांच्या या हकीकतीत आपणास पाहावयास मिळतो.

पण शांतेच्या बाबतीत विधिलिखित वेगळेच होते. तिच्या जीवनाचा अंत शोकात्म व्हावयास होता व नियतीलाही यशाचे माप जनाबाईंच्या पदरात टाकावयाचे नव्हते. दुर्दैवाने दोन-एक वर्षांतच शांताला क्षय झाल्याचे कळून आले. शांतेला शाळेत न ठेवता रास्ता पेठेतील इस्पितळात उपचारार्थ ठेवणे भाग पडले. संसर्गजन्यतेमुळे शांताची भेट घेण्यासही इतरांना मनाई करण्यात आली. मिस् सोराबजींची शांता एवढी लाडकी पण त्यांनीही कठोरणा धारण केला आणि इतरांनाही तिच्याकडे जाण्यास बंदी केली. रविवारी प्रार्थनासमाजात वासुदेवराव सुखटणकर शांतेला टांग्यात घालून येत. अशी एक-दोनदाच शांताची व जनाबाईंची भेट झाली. जनाबाईंनी शांतेला म्हटले, “शांते, धीर सोडायचा नाही बरं! मरूबिरू नकोस, नाही तर मग बघ, मेलीस तर चांगलीच ठोकून काढीन.”२ जनाबाईंचे उद्गार ऐकून तिच्या मैत्रिणी व शांताही खूप हसल्या. शांताची प्रकृती बिघडतच गेली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तिचे केस कापण्याचे ठरले. शांताची आई वारल्यापवर तिच्या केसाची निगा जनाबाईंनीच घेतली. त्या रोज रात्री खोबरेल तेल तिच्या डोक्यावर जिरवीत असत. केस लवकर उगवले नाहीत आणि शांतानेही प्रयत्न सोडायला सांगितला. तरीही जनाबाईंनी चिकाटी सोडली नाही. पुढे पुढे शांताच्या डोक्यावर केस येऊ लागले व अखेरीस तिचा तिचा केशसंभार एवढा विपुल झाला की, तिच्या मैत्रिणींना हेवा वाटावा. इतक्या परिश्रमानंतर वाढविलेले केस कापणे शांताच्या जीवावर आले होते. परंतु ते कापावेच लागले. कापल्यानंतर ते फेकून देण्याच्या देण्याच्या आधी ते केस जनाबाईने बघावे असा शांताने आग्रह धरला. शांता थोड्याच दिवसांची सोबतीण होती. सर्वांनीच तिची आशा सोडली होती. म्हणून तिच्या आग्रहाखातर वासुदेवराव शाळेत येऊन लेडिज सुपरिटेंडेंटकडे जनाबाईला घेऊन जाण्याची परवानगी मागू लागले. मोठ्या मिनतवारीने फक्त दहा मिनिटे भेटण्याच्या अटीवर मिस् सोराबजींनी परवानगी दिली. जनाबाई स्वतः प्लुरसीच्या रुग्ण होत्या, म्हणून त्या विशेष काळजी घेत होत्या. अधिकची दक्षता म्हणून घेऊन येण्यासाठी शाळेच्या गड्यालाही त्यांनी पाठवून दिले. जनाबाईंनी शांताची अखेरची भेट घेतली. तिच्यासमोर एका टोपलीत तिचे केस काढून ठेवले होते. ते बघताच जनाबाईंच्या डोळ्यांत टचकन पाणि आले दुःखातिशयाने दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दोघी एकमेकींकडे पाहून आपल्या भावनांना वाट करून देत होत्या. स्वतःजवळ येण्याची खूण करून शांताने जनाबाईला पाठीवरून हात फिरवण्यास क्षीण आवाजात सांगितले. त्या हात फिरवू लागताच शांता म्हणाली, “जनाक्का, मागे तुम्ही मला ताकीद केली होती ना, की मरू नकोस म्हणून आणि मेलीस तर ठोकून काढीन म्हणून. तर आता काही मी तुमचे ऐकत नाही. तेव्हा मी मरायच्या अगोदरच मारून घ्या बरं. आतापर्य़ंत ठोकून ठोकूनच मला इतक्या सुस्थितीत आणून सोडलीत, पण नशिबच फुटकं माझं. तेव्हा आता शेवटचं ठोकून घ्या बघू.”३

मरणाच्या दारातील शांताच्या तोंडचे हे शब्द ऐकून जनाबाईंचे अंतःकरण फाटून गेले.  त्यांच्या अंतःकरणात दुःखाचा जो कल्लोळ माजला असेल त्याची केवळ अपुर्ती कल्पनाच आपण करू शकतो. एका निरागस अश्राप जीवाची जगण्यासाठीची धडपड आणि त्या जीवाला जगविण्यासाठी आधार द्यावा म्हणून दुस-या एकीने केलेले अविश्रांत श्रम आणि उत्कट सेवाभाव ह्यांचा ठसा शांताची ही करुण कहाणी आपल्या मनावर उमटविते.
             
संदर्भ
१. जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, साप्ताहिक तरूण महाराष्ट्र.
२. तत्रैव, १०-६-१९४९.         
३. तत्रैव, १०-६-१९४९. 

हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती व्याख्यान व नाट्यप्रयोग

ऑक्सफर्ड येथील वास्तव्याच्या अखेरच्या दिवासात विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली एक विशेष गोष्ट म्हणजे तेथील युनिटेरियन समाजापुढे दिलेले एक व्याख्यान व त्याच्या जोडीने दाखविलेले नाट्यरूप देखावे. ऑक्सफर्डमधील सर्व युनिटेरियन समाजातील स्त्री-पुरुषांचा परिचय व्हावा, विचारविनिमय वाढावा म्हणून वर्षातून निदान एक तरी मोठे स्नेहसंमेलन भरविण्यात येत असे. मार्चच्या आरंभी भरलेल्या अशा स्नेहसंमेलनात शिंदे यांनी हिंदुस्थानातील गृहस्थिती व समाजस्थिती या विषयावर निबंध वाचला व ती कशी असते हे प्रत्यक्षपणे दाखविण्यासाठी मध्यम स्थितीतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट करून दाखविली.

व्याख्यानाच्या प्रारंभीच त्या श्रोतृवर्गापुढे ह्या विषयावर बोलणे कसे अडचणीचे आहे हे त्यांनी नमूद केले. “ह्या आधुनिक आणि सुसंस्कृत समजल्या जाणा-या जगातील सर्वसामान्य स्त्री-पुरुष जेव्हा ह्या विषयावरील व्याख्यान ऐकायला येतात तेव्हा आपली करमणूक व्हावी ही त्यांची अपेक्षा असते; उद्बोधक विचार ऐकायला मिळावेत अशी त्यांची अपेक्षा नसते. हिंदुस्थानात राहून आलेले ख्रिस्ती मिशनरी, तसेच सखोल निरीक्षण व चांगली सहानुभूती असलेली अन्य मंडळी ह्यांनी ह्या प्राचीन गौरवशाली देशाचे आपल्याला समजलेले सत्य म्हणून जी चित्र रेखाटलेली आहेत ती काही फारशी स्पृहणीय नाहीत आणि ह्याची भारतीयांना कल्पना नाही असे नाही. अशा परिस्थितीत आपल्या भारताच्याच एका पुत्राने आपल्या पवित्र गृहस्थितीची आणि समाजाची अंगे परकीयांसमोर उघडी करावीत हे त्यांना खचित आवडणारे नाही. कारण ह्या परकीयांच्या सहानुभूतीची त्यांना खात्री असत नाही. मात्र सध्याच्या युगात आपण आपल्या पूर्वजांपेक्षा एकमेकांना अधिक सहजपणे समजून घेऊ शकतो असा माझा विश्वास आहे. मात्र हेही आपण विसरता कामा नये की, हा या युगाचा प्रारंभकाळ आहे. हिंदू जीवनातील संगीत युरोपियनांच्या कानांपर्यंत पोहोचत नाही. पौर्वात्यांचा पेहराव, घर, सामानांपैकी कित्येक वस्तू युरोपियनांच्या डोळ्यांना काहीशा चमत्कारिक, फार झाले तर प्रेक्षणीय वाटतात. जी गोष्ट सौंदर्यकल्पनेबाबतची आहे तशीच औचित्य-कल्पनेबाबतचीही आहे आणि हा मतभेद केवळ तुमच्याच पक्षी आहे असे नव्हे. मागच्या राज्याभिषेकाच्या वेळी येथे मोरोक्कोचा प्रतिनिधी आला होता. त्याच्याबाबत असे सांगितले जाते की, परतीच्या वेळी तो म्हणाला, ‘इंग्लंड हा देश मोठा आहे; पण मला समाधान वाटते की मी संस्कृतीकडे परत जात आहे.’ ह्यावरून एवढेच दिसते की जगाचे सौंदर्यशास्त्र त्याचप्रमाणे नीतिशास्त्र परंपरेच्या आणि राष्ट्रीय पक्षपाताच्या पाशातून अजून मुक्त झाले नाही.

“माझा प्रस्तुतचा प्रयत्न हा माझ्या देशवासीयांना अप्रयोजकपणाचा वाटण्याची शक्यता आहे आणि हा धोका मी पत्करलाही नसता. परंतु तुमच्यामध्ये असताना मला कुठल्याही प्रसंगी मी तुमच्यात परका आहे, अशा प्रकारची जाणीव व्हावी असा प्रसंग कधीही घडला नाही. मला तुमच्याकडून सौहार्द व हे समाश्वसन मिळाल्यामुळे माझ्या देशवासीयांच्या जीवनाबद्दल बोलायला मला संकोच वाटत नाही.” या प्रकारची प्रस्तावना केल्यानंतर त्यांनी आपल्या व्याख्यानात पुढीलप्रमाणे प्रतिपादन केले, “हिंदुस्थान हे केवळ एक भौगोलिक नाव आहे अशा समजुतीनेच अनेकदा उल्लेख केला जातो. मला म्हणावेसे वाटते की, असे समजणे रास्त नाही. जो देश युरोपच्या निम्म्याइतका आकाराने मोठा आहे त्यात तुमच्या इंग्लंडातल्याप्रमाणे राजकीय एकात्मता, त्याचप्रमाणे जीवनपद्धतीतील बाह्य सारखेपणा यांची कशी अपेक्षा करता येईल? इंग्लंड शब्दाने मला तुमचे ‘चिमुकले इंग्लंड’ अभिप्रेत आहे; इंग्रजांचे साम्राज्य नव्हे. हिंदुस्थान देशाने प्रचंड उलथापालथ करणा-या घटना इतिहासकाळात अनुभवलेल्या आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. एक चिनी लोकांचा अपवाद वगळला तर भारतीयांप्रमाणे भूतकाळ जगणारे अन्य लोक जगाच्या पाठीवर नाहीत. शिवाय हेही खरे आहे की, हिंदुस्थानने जितके म्हणून वंश आणि धर्म आपल्यात सामावून घेतले आहेत तसे जागाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशाने केलेले नाही. थोडक्यात, हिंदुस्थान म्हणजे मानवंशशास्त्रज्ञासाठी एक परिपूर्ण भांडार आहे. मात्र एवढी सारी विविधता असल्यामुळे हिंदुस्थान म्हणजे केवळ एक भौगोलिक नाव आहे असे म्हणणे न्याय्य ठरणार नाही. ह्या खंडप्राय देशात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा समान नमुना सहजपणे शोधून काढता येतो. हिंदुस्थानची चारपंचमांश लोकसंख्या हिंदू म्हणविणारे आणि जैन, शीख, लिंगायत व बौद्ध यांची आहे. मात्र त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि उपासनेचे प्रकार यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी फारसा संबंध असत नाही. सामाजिकदृष्ट्या ते सर्व हिंदू आहेत. एवढेच नव्हे तर लोकसंख्येच्या पाचव्या हिश्श्याने असलेले मुसलमान हेही त्यांच्या राहाटीच्या दृष्टीने आपल्या अन्य देशबांधवांसारखेच आहेत; अन्य देशातील मुसलमानांसारखे नाहीत. म्हणून ज्या एखाद्या गावावर अथवा नगरावर पाश्चात्त्य कल्पनांचा प्रत्यक्ष प्रभाव पडलेला नाही तेथील हिंदू कुटुंबाचे मी जर वर्णन केले तर एक पार्शी सोडून ते कोणत्याही समाजाचे प्रातिनिधिक वर्णन ठरेल.”

भारतीय गृहस्थितीचे वर्णन करताना त्यांनी म्हटले, “भारतीय घर हे एका प्रचंड वृक्षासारखे असते. मुख्य आधार, आईवडिल यांचे खोड. त्यालाच मुलगे आणि नातू यांच्या कुटुंबाच्या अनेक फांद्या फुटलेल्या असतात. मात्र त्यांच्यामध्ये सजीव ऐक्य असते. ही सारी मिळून एक सेंद्रीय पूर्ण (ऑरगॅनिक होल) बनते. कर्ती मुले आणि नातवंडे स्वतः कमाई करीत असली तरी सामान्यतः ह्या व्यवस्थेपासून ते विभक्त होत नाहीत. कुटुंबाची वाढ ही एखाद्या वडाच्या झाडाप्रमाणे होत असते. शाखांपासून निघणारी मुळे जमिनीत रुजत असतात व कालांतराने ही मुळेच खोड अथवा सोट बनतात व मूळ वृक्षाची ताकद व विस्तार वाढवीत असतात. कधी कधी कुटुंबे विभक्त झाल्याची उदाहरणे आढळतात खरी; परंतु हा इथल्याप्रमाणे नित्याचा प्रकार नसून क्वचित संभवणारा असतो त्यामुळे कधी कधी असेही दृश्य दिसते की, एखाद्या घरात चाळीस-पन्नास माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. असे घर म्हणजे ‘देवाचे राज्य’ म्हटले नाही तरी ‘देवाची वसाहत’ म्हणता यावे असे असते. सख्यभाव नष्ट झाला अथवा विपरीत परिस्थितीने घरापासून फुटून राहावे लागले तर फुटून निघणारे कुटुंब मूळ घराच्या समोरच राहाते. कधी कधी अशी कुटुंबे एखाद्या गल्लीच्या मुख्य भाग बनतात. आणि ती गल्ली त्या कुटुंबाच्या नावाने ओळखली जाते.
 
“अशा कुटुंबात चालणारी सत्ता राजेशाही पद्धतीची असते आणि कुटुंबातील वडीलधारा पुरुष हा राजाप्रमाणे सत्ता चालवीत असतो. मात्र आपल्या पत्नीच्या सौम्य आणि मधुर इच्छेनुसार आपल्या निर्णयात बदल करीत असतो वा मुरड घालीत असतो. हा अधिकारशहा ज्या वेळेला वृद्ध होतो तेव्हा आपले अधिकार सामान्यतः आपल्या थोरल्या मुलाकडे सुपूर्त करतो आणि हा थोरला भाऊ आपल्या इतर भावांना बापाच्या ठिकाणी असतो. एवढेच नव्हे तर त्याच्या बायकोला आईसारखा मान मिळत जातो. अर्थातच हा जुना आदर्श आजच्या काळात पूर्णपणाने पाळला जाईल असे नाही. मात्र जेथे तो पाळला जात नाही तेथेसुद्धा या मूळ आदर्शाची जाणीव निश्चितच असते.”

ह्यानंतर शिंदे यांनी घरामध्ये सुनेची स्थिती कशी असते याचे मोठे परिणामकारक चित्र रेखाटले आहे. “अशा ह्या हिंदू कुटुंबातील कारुण्याचे आस्थाकेंद्रच वाटावी अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे घरातील सून. ही सून म्हणजे दुःखभोग आणि स्वार्थत्याग यांची प्रतीमा असते. ती म्हणजे हिंदुस्थानातील स्त्रीवर्गाचा आत्माच होय. कुटुंबातील तिचे स्थान सगळ्यांत खालचे, सर्वांत उपेक्षित असते. कधी कधी छळही होणारी ही सून क्रमशः स्वतःचे सामर्थ्य वाढवीत भावी काळातील पालनकर्ती बनत असते. दैवी वाटावेत असे कौटुंबिक सद्गुण तिच्या ठिकाणी असतात. आईबापांकडून या लहानगीचे लाड होत असतानाच ती कळायच्या आधीच विवाहित होते आणि अनोळखी लोकांमध्ये फेकली जाते. तिला स्वतःचे असे सुख मिळविता येत नाही. घरातल्या लहानग्यांपासून तो थोरापर्यंत सगळ्यांना खूष ठेवण्याची जबाबदारी मात्र तिची असते. सगळ्यांच्या शेवटी ती झोपायला जाणार आणि सगळ्यांच्या आधी तिला उठावे लागणार. इतर उभे असताना तिने खाली बसता कामा नये. परक्यांसमोर घरातील कुणाही पुरुषव्यक्तीबरोबर बोलता कामा नये. आईवडील अथवा इतर वडीलधारे ह्यांना ती नव-यासोबत दिसणे हा त्यांचा अपमान. तिने तो कधीही करता कामा नये आणि बायकोला नावाने हाक मारणे म्हणजे
वडीलधा-यासमोरचे उद्धट वर्तन. घराच्या ह्या भावी राणीला या दिव्यातून जावे लागते.” हिंदू घरातील सुनेचे हे वर्णन करताना शिंदे यांच्या मनासमोर त्यांची कारुण्यमूर्ती आई प्रतीकरूपाने असणार.

त्यानंतर शिंदे यांनी हिंदू घरातील मुलीचे लग्न ही बाब कशी महत्त्वाची असते आणि लग्नाचा सोहळ कसा चालतो याचे वेधक वर्णन केले आहे. ते म्हणाले, “सगळ्या घराचे लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे लहानग्या मुलीचे लग्न. कधी कधी ही बाब चिंतेचीही ठरते. मुलीचे वय फार वाढलेले असते-म्हणजे बारा वर्षांहून जास्त झालेले असते. ह्यामुळे आईबापांना तिच्या चिंतेचा घोर कसा लागतो याचे मराठी नाटकातही वर्णन केले आहे.

“अखेर विधिवशात म्हणा अथवा मध्यस्थाच्या योजकतेने म्हणा लग्न जुळते आणि मग कधी कधी पंधरवडाभर टिकणारा लग्नाचा जो आनंदोत्सव चालतो त्याचे वर्णन काय करावे? जवळची आणि दूरची शेकडो माणसे ह्या नवरा-नवरीभोवती गोळा होतात आणि त्या बिचा-या नवरा-नवरीला या उत्सवामध्ये आपले काय स्थान आहे याची फारशी जाणीवही नसते. मी हिंदू विवाहपद्धतीतील एका सत्यपूर्ण गोष्टीचा निर्देश करतो आणि ती म्हणजे हिंदू विवाह हा सर्वार्थाने संस्कार असतो. विवाह म्हणजे एक सामाजिक करार असतो; व्यक्तिगत सुखाची बाब असते; अशा कल्पनांचा हिंदू विवाहाशी दूरत्वानेही संबंध असत नाही. तो एक धार्मिक भूमिकेतून केलेला स्वार्थत्याग असतो. व्यवहारी वृत्तीच्या पश्चिम जगाचा यावर विश्वास बसणे कठीण. परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेली हिंदुस्थानातील ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये वेदनादायक भाग एवढाच की, ही विवाहपद्धती पुरुषजातीच्या बाबतीत पक्षपाती असते. स्त्रीजातीला मात्र ही पद्धती भूषणावह ठरणारी नाही.”

विवाह समारंभातील मांडव कसा असतो, चारी बाजूला केळीचे खुंट उभारलेले असतात, हे केळीचे खुंट स्वार्थत्यागाचे आणि स्त्रियांमधील सद्गुणांचे प्रतीक असतात वगैरे गोष्टींचे निवेदन केल्यानंतर ह्या विवाहविधीने कालपर्यंत जी एक खेळकर मूल होती तिचे रूपांतर आज मर्यादशील वागणा-या पत्नीमध्ये झालेले असते, असे ते नमूद करतात.

“हिंदू घरामधील आनंदाचा दुसरा प्रसंग म्हणजे पुत्रजन्म होणे. मुलाच्या जन्माने आनंद तर मुलीच्या जन्माने निराशा. मुलासाठी संस्कृतमध्ये पुत्र हा जो शब्द आहे त्याचा अर्थच मुळी आपल्या पूर्वजांना पूनामक नरकात जाण्यापासून वाचविणारा असा आहे. माणसामध्ये असणारी वंशसातत्याची जी स्वाभाविक इच्छा असते तिला ही समजूत बळकटी आणणारी आहे. जन्मणारा मुलगा जेवढ्या संपत्तीचा वारसदार होणार असतो तिच्या भूमितीश्रेणीच्या पटीने हा आनंद वाढत असतो. मी एकदा हिंदुस्थानातील एका संस्थानाच्या राजधानीतील पुत्रजन्माचा सोहळा चालला होता त्या वेळी उपस्थित होतो. अग्रभागी संस्थानचा प्रचंड हत्ती व पाठीमागून घोडे व हत्ती अशी मिरवणूक निघाली होती. हत्तीच्या पाठीवर चांदीचे एक भले मोठे पात्र साखरेने भरले होते. त्यातून वाटी वाटी साखर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक घरामध्ये पाठविली जात होती. ही मिरवणूक पंधरवडाभर चालली होती.”१

निबंधाच्या प्रारंभी प्रास्ताविकात शिंदे यांनी असे विधान केले आहे की हिंदू जीवनातील संगीत युरोपियनांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्ष निबंधात मात्र ह्या विधानाचे विवरण आढळत नाही. ह्या निबंधाचे ‘सम पिक्चर्स इन् ए हिंदू होम’ ह्या शीर्षकाखाली केलेले काही मुद्यांचे टाचण पाहावयास मिळते.२ त्यामध्ये त्यांनी असे विधान केले आहे की, “आज राजा आणि राम (गृहिणी सचिवः) यांनी पत्नीवियोगानंतर केलेल्या विलापातून, त्यांच्या झुरण्यातून आणि रुदनातून हिंदू प्रेमाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार पाहावयास मिळतो.” हे व्याख्यान त्यांनी केवळ वाचून दाखविले नसावे तर अधूनमधून ते भाष्यही करीत असावेत, निबंधात न केलेल्या विवरणाची भर घालीत असावेत, असे दिसते.

व्याख्यानाच्या दुस-या भागामध्ये शिंदे यांनी हिंदुस्थानातील समाजस्थिती, तेथील सुधारणा व इंग्रज सरकारची व लोकांची त्याबद्दलची भूमिका यासंबंधी महत्त्वाचे विचार मांडले. ते म्हणाले, “मागच्या शतकात हिंदुस्थानचा चेहरामोहरा बदललेला आहे. धर्म, समाज राजकारण, उद्योग यांची स्थिती अशी झालेली आहे की, ती सारी जणू काय एका प्रचंड कढईत फेकल्यामुळे खदखदत आहेत. तेथे चाललेल्या पुनर्घटनेला चालना देण्याची अंतिम श्रेय ब्रिटनला मिळणार आहे. मात्र सध्याचा विकास एवढा दांडगा आहे की त्याचे श्रेय ब्रिटनसारख्या मानवी यंत्रणेला, मग ती कितीही मोठी असो, देणे रास्त ठरणार नाही. या सनातन देशातील लोकांची धारणा हळूहळू, किंवा माझ्या मताने तर वेगाने पुनर्घटित होत आहे. केशवचंद्र सेन ह्यांच्यासारख्या धर्मनिष्ठ व्यक्तीला तर त्यामागे दैवी योजना आहे असे वाटते.

“सध्याच्या काळी हिंदुस्थानच्या सामाजिक स्थितीबाबत बोलणे याचा अर्थच तेथील सामाजिक सुधारणेविषयी बोलणे असा होतो. सगळे लोकनेते आणि बंडखोर पुरुष हे मूलतः समाजसुधारकच आहेत - मग ते मान्य करोत अथवा न करोत. प्रारंभाच्या काळात ब्रिटिश सरकारने राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांसारख्या आद्य सुधारकांना सतीची चाल बंद करण्यासाठी, विधवांना पुनर्विवाहाची मुभा देण्यासाठी कायदे करून साहाय्य केले. परंतु लवकरच त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव झाली आणि सध्या ते अशा बाबतीत उदासीन आहेत. सगळ्या देशाच्या पातळीवर शिक्षणप्रसार करणे हा जरी सुधारणेचा प्रभावी मार्ग असला आणि केवळ सरकारच या बाबतीत खूप काही करू शकत असले तरी ते ह्या बाबतीत आपली जबाबदारी टाळीत आहेत ही गंभीर बाब आहे.”

यानंतर शिंदे यांनी असे विधान केले की “जगातल्या कित्येक मोठ्या चळवळीप्रमाणे हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेचा प्रारंभकाळ हा अतिशय रोमँटिक कालखंड होता.” ब्राह्मसमाजाचे सुप्रसिद्ध पुढारी पंडित शिवनाथशास्त्री यांनी प्रसिद्ध केलेल्या साहित्यातील दोन महत्त्वाच्या घटना त्यांनी सांगितल्या. त्यांपैकी पहिली बंगालमधील बारीसाल येथे १८६२ मध्ये राहणा-या एका तरुण ब्राह्म वकिलासंबंधीची होती. त्याच्या वडिलांनी पहिली पत्नी निवर्तल्यानंतर आपल्या आईच्या सांगणावरून त्या वेळच्या चालीप्रमाणे नऊ-दहा वर्षांच्या मुलीशी लग्न केले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या लहानग्या सावत्र आईची जबाबदारी तरुण ब्राह्म वकिलावर पडली. आपल्या सावत्र आईची करुण अवस्था पाहून ह्या ब्राह्म वकिलाने आपल्या पत्नीच्या सहकार्याने एक व्यूह आखला व अनेक संकटांना तोंड देत आपल्या सावत्र आईचे लग्न आपल्या एका विश्वासू मित्राबरोबर लावून दिले, वगैरे चित्तथरारक हकिकत त्यांनी निवेदन केली.

दुसरी रोमांचकारी हकिकत जी सांगितली ती १८७० मधील एका सतरा वर्षांच्या कुलीन म्हणजे उच्चवर्णीय मुलीबाबतची होती. तिच्या कर्मठ चुलत आजोबाने तिचा विवाह आधीच तेरा लग्ने केलेल्या एका धर्मनिष्ठ ब्राह्मणाशी करण्याचा बेत आखला होता. ह्या तरुण कुलीन मुलीने ब्राह्म असलेल्या आपल्या दोन चुलत बहिणींना ही हकिकत कळवून, आपली सुटका केली नाही तर आपण आत्महत्या करू असे पत्र लिहून कळविले. ह्या ब्राह्म चुलत बहिणींनी तरुण विद्यार्थ्यांच्या साहाय्याने तिची सुटका करून विशाल पद्मा नदीला प्रचंड पूर आला असतानाही नावाड्याला नदीत नाव सोडावयाल भाग पाडले आणि कलकत्त्याला तिच्या ब्राह्म बहिणींच्या स्वाधीन केले. कालांतराने तिचा विवाह प्रतिष्ठित अशा ब्राह्माशी झाला.

सुधारणेच्या पहिल्या पर्वातील या प्रकारच्या रोमांचकारी घटनांचे शिंदे यांनी वर्णन करून सध्या या प्रकारचा रोमान्स-अद्भुत घडण्याचा भाग-जोरात असल्याचे सांगितले. सुधारणेचे पूर्ण यश हे बहुजन समाजात होणा-या शिक्षणप्रसारावर अवलंबून आहे ही बाबही निदर्शनास आणली.

हिंदुस्थानातील जातिव्यवस्था आणि तेथील इंग्रज लोक यांविषयी शिंदे नंतर बोलले, “हिंदुस्थानात सुमारे तीनशे मोठ्या जाती आहेत आणि जवळ जवळ तितक्या पोटजाती आहेत. जातिव्यवस्था हा हिंदुस्थानच्या राष्ट्रीय स्वास्थ्याला अत्यंत विघातक ठरणारा अडथळा आहे. ह्या क्षेत्रात सुधारकांना करावा लागणारा झगडा अत्यंत बिकट स्वरूपाचा आहे.

“हिंदुस्थानच्या सामाजिकतेला असा एक पैलू आहे की, ज्याचा संबंध तेथे राहणा-या इंग्रजांशी पोहोचतो. हे लोक तेथील जातिव्यवस्थेचा निषेध करणा-याच्या कामी अजिबात मागे नाहीत. मात्र त्यांचे स्वतःचे वर्तन ह्या निषेधाशी जुळणारे कितपत असते? अँग्लो-इंडियनांचा वेगळेपणा जेवढा म्हणून राखला जातो आणि त्यांना जेवढे म्हणून संरक्षण मिळते तेवढे संरक्षण अन्य कोणत्याही जातीला मिळत नाही. ब्राह्मण आणि शूद्र एकत्र जेवणार नाहीत. आंतरजातीय लग्ने करणार नाहीत हे खरे; पण बाकी बाबतीत मात्र त्यांचे संबंध अगदी सलोख्याचे असतात. इंग्रज माणसे शंभर वर्षांपूर्वी जितकी परकी होती तितकीच परकी आजही आहेत. एवढेच नव्हे तर भविष्यातदेखील तसेच राहण्याचा त्यांचा निर्धार दिसतो. हिंदुस्थानचे कमांडर इन चीफ लॉर्ड रॉबर्ट्स नेहमी आग्रहपूर्वक सांगत की, हिंदुस्थान तलवारीच्या जोरावर जिंकला आहे तलवारीच्या जोरावर राखला जाईल. लॉर्ड रॉबर्ट्स हे लष्करातील पुरुष आहेत आणि त्यांच्याकडून अधिक चांगल्या अपेक्षा करता येणार नाहीत. पण ऑक्सफर्ड विद्यापीठातील इतिहासाचे नामवंत प्राध्यापक मिस्टर ट्राऊड ह्या विधानाचा पुनरुच्चार करतात आणि भरीला म्हणतात की, पराभवाची नामुष्की पत्करल्याशिवाय आम्ही हिंदुस्थान सोडू असे म्हणणे म्हणजे जाणीवपूर्वक प्रचंड भ्रमात राहण्यासारखे ठरेल. असे जर आहे तर अँग्लो-भारतीयांनी हिंदुस्थानात स्वतःची एक वेगळीच (जखडबंद) जात तयार केली, यात नवल ते काय? ह्या अप्रिय बाबीचा निर्देश करताना मला बरे वाटत नाही. ह्या बाबीशी अन्य गंभीर प्रश्न जर गुंतलेले नसते तर मी ह्या अप्रिय बाबीचा उल्लेख टाळला असता. हे प्रश्न राष्ट्रीय स्वरूपाचे नाहीत; ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. त्यांचा संबंध अखिल मानव जातीशी येतो. फक्त भारतातच प्राचीन आणि आधुनिक जगे एकत्र येत आहेत. प्राचीन धर्म आणि प्राचीन तत्त्वज्ञान, जुन्या आकांक्षा आणि जुनी वैशिष्ट्ये त्यांच्या शुद्ध स्वरूपात तेथेच जतन केली आढळतात. आता तेथेच आधुनिक विचार आणि आधुनिक जीवनप्रणाली हळूहळू भूतकाळाच्या खडकाळ आणि खोलवर भूमीत मुळे रुजवीत आहेत. इतिहासात अनन्यसाधारण असलेल्या अशा आणीबाणीच्या काळात हिंदुस्थानातील इंग्रज हे स्वतःला संकुचित राजकीय आणि व्यापारी जाणिवेपेक्षा उंचावू शकले नाहीत. हिंदुस्थानात जी दैवी घटना घडत आहे ती ध्यानात न घेता हिंदुस्थानला जिंकण्याचा किरकोळ प्रसंग जर ते विसरू शकले नाहीत; मानवी सुसंवाद आणि एकात्मता ह्याऐवजी ते जर स्वतःचे एकांगी वंशश्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा आग्रह धरीत बसले आणि याउप्पर “केवळ पराभवाची नामुष्की पत्करावी लागली तरच हिंदुस्थान सोडू” अशा प्रकारची भाषा अहंकाराने बोलत राहिले, तर तेथे सुरू झालेल्या दैवी प्रयोगाचे ते जे नकळतपणे साधन झालेले आहेत त्या प्रयोगाला त्यांनीच जाणीवपूर्वक व सहेतुकपणे अडथळा आणला असे होईल.”

ह्या मुद्दयाचा समारोप करताना शिंदे म्हणाले, “कदाचित कुणी विचारू शकेल की, ज्या परकीयांच्या विरोधात एखादे राष्ट्र आहे त्याच्यामध्ये कसे मिसळावयाचे? मी परवा नुकतेच निधन पावलेले ब्रटिश अँड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे हिंदुस्थानातील प्रतिनिधी असलेले रेव्ह. फ्लेचर विल्यम्स यांच्या स्मारकासंबंधीचा वृत्तान्त वाचीत होतो. मी स्वतःलाच प्रश्न केला की, यांचे स्मारक काय म्हणून? आणि एवढ्या मनःपूर्वकपणे एकमताने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्सव कलकत्त्यातील ब्राह्म आणि ब्राह्मेतर का बरे साजरा करीत आहेत? त्याचे उत्तर मला सापडले. त्यांनी इंग्लंडचे प्रतिनिधित्व अत्यंत यशस्वीपणे केले आणि त्यांच्या यशाचे रहस्य हे की, ते भारतीय लोकांमध्ये राहिले, लोकांत वावरले, त्यांच्यामध्ये मिसळले, त्यांच्या पैकीच एक बनून गेले. हिंदुस्थानच्या अंतःकरणात स्थान मिळविणारा एक फ्लेचर विल्यम्स हा त्यांच्या दृष्टीने सरहद्दीवर रानटी टोळ्यांशी लढणा-या अर्धा डझन लॉर्ड रॉबर्टसपेक्षा जास्त मोलाचा आहे. राजकीय हिंदुस्थान ही केवळ ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासातील एक अवस्था आहे, तर सामाजिक इंग्लंडशी जुळणारा आणि संवादी असणारा सामाजिक हिंदुस्थान ही जगाच्या इतिहासातील एक अवस्था ठरेल.”

शिंदे यांनी १९०३ सालच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सफर्डमध्ये दिलेले हे व्याख्यान अनेक दृष्टींनी महत्त्वाचे वाटावे असे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी प्रगल्भ बनले होते हे त्यामधून जाणवते. एकेश्वरी धर्माची उदात्त व्यापक बैठक त्यांच्या मनोधारणेला व विचारांना प्राप्त झाली होती. ह्या भूमिकेतूनच ते संपूर्ण जगाच्या इतिहासाचे व संस्कृतीचे अवलोकन करतात. वरवरचे भेद मिटून खराखुरा बंधुभाव विश्वात्मक पातळीवर प्रस्थापित व्हावा ही आध्यात्मक जाणीव त्यामधून प्रकट होते. ह्या उन्नत पातळीवरू इंग्रजांच्या उणिवा त्यांच्यासमोर निर्भीडपणे सांगण्याचा आत्मविश्वासही त्यांच्या ठिकाणी होता. या व्याख्यानातून त्यांची राष्ट्रीय वृत्ती दिसून येते खरी; मात्र ती एकांगी, पक्षपाती स्वरूपाची नाही. त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेला आध्यात्मिक अधिष्ठान होते. ज्या समानधर्मीयत्वामुळे महात्मा गांधी हे त्यांना पुढच्या काळात आदरणीय वाटू लागले, तशाच प्रकारची वैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक वृत्ती शिंदे यांच्या या व्याख्यानातून प्रकट होताना दिसते.

ऑक्सफर्डमधील युनिटेरियनांच्या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी त्यांनी हे व्याख्यान दिले ही गोष्टही औचित्यापूर्ण होती. विश्वात्मक स्वरूपाच्या एकेश्वरी धर्माचे अनुयायी असलेले इंग्रज स्त्री-पुरुष हे शिंदे यांची भूमिका समजून घेण्याची शक्यता होती. अन्यत्र त्यांनी हेच व्याख्यान दिले असते तर त्याला संपूर्णपणे राजकीय रंग प्राप्त होणे जास्त संभवनीय होते. योग्य व्यासपीठावरून हे व्याख्यान दिल्यामुळे त्याला योग्य ती प्रसिद्धीही मिळाली. इंग्लंडमधील युनिटेरियन समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘दि इन्क्वायरर’ मधून १४ मार्च १९०३ रोजी ते प्रसिद्ध झाले. मिस्टर हॉजसन पॅट नावाच्या गृहस्थाने त्याचे फ्रेंचमध्ये भाषांतर करून ‘ला पेक फ्रान्स’ नावाच्या वृत्तपत्रात १६ एप्रिल १९०३ रोजी ते प्रसिद्ध केले.

शिंदे यांनी हे व्याख्यान या स्नेहसंमेलन प्रसंगी वाचून दाखविले, एवढेच नाही तर हिंदू गृहपद्धती व सामाजिक स्थिती कशी असते हे प्रत्यक्ष दाखविण्याकरिता मध्यम स्थितीतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट करून छोटेखानी नाट्यप्रयोग सादर केला.३ शिंदे यांच्या ठिकाणी मुळातच एक प्रकारची रसिकता होती. हा निबंध लिहिताना संगीत ‘शारदा’ हे नाटक त्यांच्या मनासमोर तरळत होते. त्यामधील काही घटनांचाही निर्देश त्यांनी आपल्या निबंधात केलेला आहे. स्वाभाविकपणेच त्यांना असे वाटले की, केवळ निबंधातून हिंदू गृहस्थितीचे आणि समाजस्थितीचे वर्णन करण्यापेक्षा त्यासंबंधीचे काही देखावे जर साक्षात उभे केले तर ते अधिक प्रत्ययकारी ठरतील व त्याप्रमाणे त्यांनी योजनाही केली. ऑक्सफर्डमध्येच विविध वस्तूंचा संग्रह करणा-या एका कराचीच्या व्यापा-याची त्यांना माहिती मिळाली. त्याच्याकडून त्यांनी हिंदू घरामध्ये असतात तशा वस्तू, फर्निचर, तसेच पोशाख, नकली दागदागिने वगैरे मिळविले व त्याची मांडणी करून हिंदू घर जसे असते तसे पूर्णपणे सजविले. काही इंग्रज तरुण-तरुणींना हिंदी पद्धतीप्रमाणे पोशाख देऊन हिंदू पद्धतीप्रमाणे बसविण्यात आले होते. नवीन लग्न झालेली सूनबाई कोप-यात भिंतीकडे तोंड करून कशी बसते, जवळ आलेल्या परीक्षेसाठी तिचा नवरा मोठमोठ्याने घोकंपट्टी करीत दुस-या कोप-यात कसा बसतो, कुणी वडीलधारे माणूस अवचित आल्यावर दोघे उठून कसे नमस्कार करतात वगैरे दृश्ये हावभावासकट दाखविण्यात आली. शिंदे यांचे व्याख्यान व देखाव्याचा प्रयोग असा सगळाच कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक श्रोत्यांनी शिंदे यांना भेटून त्यांचा सुस्पष्ट निबंध व कष्ट घेऊन केलेला प्रयोग आवडल्याचे सांगून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व भरपूर आभार मानले. ‘दि इन्क्वायरर’च्या संपादकांनी काही आठवड्यानंतर शिंदे यांना त्यांच्या निबंधाच फ्रेंचमध्ये झालेला अनुवाद अनेकांना आवडला असल्याचे आवर्जून कळविले.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ४४. शिंदे यांनी शाहूमहाराजांस पुत्र झाल्याच्या निमित्ताने कोल्हापुरात  आनंदोत्सव चालला होता तो पाहिला होता. त्याचेच वर्णन पस्तुत व्याख्यानात केले आहे.
२.    शिंदे यांची कागदपत्रे.
३.    Domestic and Social Life in India हा निबंध लिहिलेली शिंदे यांची वही. या निबंधाच्या अखेरीस शिंदे यांनी ह्या नाट्यप्रयोगासंबंधीची माहिती देणारी नोंद २३ मार्च १९२६ रोजी पुणे येथे केली.

स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि धर्मप्रचारकार्याला आरंभ

नेपल्सहून निघालेली रुबातिने ही बोट ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई बंदराला पोहोचली. विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई समाजाची बरीच लहानथोर मंडळी मोठ्या उत्साहाने जमली होती. मायभूमीला पोहोचल्याचा, मित्रमंडळी भेटल्याचा आनंद स्वाभाविकपणेच त्यांना झाला. शिंदे विलायतेहून धर्मशिक्षण घेऊन आल्यानंतर मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून काम करणार, तर त्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच समाजामध्ये परप्रांताहून, बाहेरगावाहून येणा-या पाहुणेमंडळींच्या निवासाचीही व्यवस्था व्हावी या हेतूने प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला यांनी प्रार्थनामंदिराच्या आवारात एक ‘राम मोहन राय आश्रम’ नावाची तीन मजली इमारत ते येण्यापूर्वीच बांधून ठेवली होती. प्रार्थनासमाजाची मंडळी शिंद्यांच्या आगमनाची उल्हासाने वाट पाहत होती. ४ ऑक्टोबर १९०३च्या सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये होळकर या सहीने एक चमत्कृतिपूर्ण स्वागतपर पद्यबंध प्रसिद्ध झालेला पाहावयास मिळतो. ह्या रचनेमध्ये शिंदे यांचे गुणगान केलेले असून त्यांच्या हातून विविध प्रकारची कार्ये घडोत व त्यांचा सहवास मिळो अशी इच्छा प्रकट केली आहे. ही पद्यरचना आर्या वृत्तात सात कडव्यांची असून तिच्या मध्यभागी इंग्रजी S ह्या अक्षरात रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. अशी अक्षरे येतील अशा खुबीने शब्दयोजना केलेली आहे.१

दुस-या दिवशी बुधवारी सायंकाळी शिंदे यांच्या स्वागतासाठी समाजबंधूंचे एक संमेलन भरले. प्रार्थनामंदिराच्या लगत भगवानदास माधवदास नावाचे समाजबंधू राहत होते. त्यांच्या बंगल्यात हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे अशा प्रकारची सूचनाही रविवारच्या सुबोधपत्रिकेच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. ह्या स्वागत समारंभासाठी बरीच लहानथोर समाजीय मंडळी उपस्थित राहिली होती. डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, दीनानाथराव माडगावकर ह्यांनी उपस्थित राहून मोठ्या आनंदाने स्वागतपर भाषणे केली. याप्रसंगी शिंदे यांच्या स्वागतार्थ गायिलेली तीन पद्ये सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये आलेली आहेत. शिंदे यांना विलायतेला जातेवेळी निरोप देण्याच्या प्रसंगी त्यांचे वृद्ध मित्र दीनानाथराव माडगावकर यांनी एख पद्ये रचले होते. आता त्यांच्या आगमन प्रसंगीही त्यांनी रचलेले पद्ये गायिले.

तरुण असता स्वार्थत्यागी।
तुम्ही दिसता भले।।
प्रभुवर कृपे धर्माभ्यासी।
तुम्हां यश लाभले।।
तरि तुमचिया हस्ते।
धर्मप्रचार बरा घडो।।
तनुमन तसे देवापायी।
सदा तुमचे जडो।।

शिंदे यांच्या स्वागतानिमित्त न्या. मू. चंदावरकर यांनी उपासना चालविली.२

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल समाजबंधूंच्या मनात मोठ्य अपेक्षा झाल्या होत्या. ह्या अपेक्षा निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची गुणवत्ता त्यांच्या ठिकाणी आहे याची प्रचिती समाजबांधवांना आलेली होती. सुबोधपत्रिकेच्या ११ ऑक्टोबर १९०३च्या अंकामध्ये संपादकीयाऐवजी रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे यांस अनावृत्त पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये शिंदे यांच्या ठिकाणी असणा-या व प्रत्ययाला आलेल्या गुणवत्तेचा नेमकेपणाने निर्देश केलेला असून शिंदे यांच्यापासून समाजबांधवांच्या कोणत्या अपेक्षा आहेत हे प्रकट केले आहे.३ मुंबईचा समाज व आपली अनेक मित्रमंडळी आपले स्वागत करण्याचा विचार काय म्हणून करीत आहेत असा प्रश्न उपस्थित करून पत्रलेखकाने म्हटले आहे, “आपण एका उदारमतप्रचारक पाठशाळेत दोन वर्षांपर्यंत उत्तम रीतीने धर्माध्यन केलेत म्हणूनच समाजाने आपले स्वागत केले असे मला वाटत नाही. त्याचप्रमाणे परदेशी असता आपण जी जी स्थळे पाहिली, आपण जो जो अनुभव प्राप्त करून घेतला, ज्या ज्या नवीन गोष्टी शिकलात त्यासंबंधाने सुबोधपत्रिकेच्या वाचकांसाठी आपल्य रसाळ व काव्यरसप्रचुर भाषेत मोठमोठी पत्रे लिहिली व ती ती स्थले आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, त्या त्या लोकांशी आपला प्रत्यक्ष परिचय होत आहे अगर त्या त्या नवीन गोष्टी आपणच स्वतः शिकत व अनुभवीत आहोत अशा प्रकारची मनोवृत्ती आपली पत्रे वाचणा-या अनेक वाचकांची होत असे, म्हणूनही हा स्वागतसमारंभ झालेला नसावा. परदेशी असता आपल्या सुटीच्या दिवसात आपण निरनिराळ्या ठिकाणी ईश्वरोपासना चालविल्या, आपल्या देशातील पुरातन उन्नत असा धर्मासंबंधाने तद्देशीय लोकांस ज्ञान प्राप्त करून दिलेत म्हणून आपला सन्मान झाला नसावा; तर आपण आमच्या समाजाला एक उत्तम बागवान सापडला आहात आणि आपण एका अमृतवल्लीचा रोपा लाविला आहात असा अनुभव आल्यावरून व आशा बागवानावाचून आणि त्याच्या त्या अमृतवल्लीशिवाय समाजाचे कार्य नीटसे होणे शक्य नाही, असा अनुभव असल्यामुळे आपला तो जोमात असलेला रोपा पाहून आपले स्वागत करणे, आपणास त्या रोप्याच्या कामी एक प्रचंड वृक्ष निर्माण करण्याच्या कार्यी उत्तेजन देणे हे आपले कर्तव्य होय असे समाजास वाटून हा समारंभ झाला असावा.”

पत्रलेखकाने आपल्या समाजाचे धर्मप्रचाराचे कार्य म्हणजे एक प्रचंड बागाईत जमीन आहे असे म्हटले असून तेथे ज्ञानप्रसाराची, धनदानाची वल्ली आणि विद्वत्तेचाही रोपा आढळेल. मात्र त्याची नीट जोपासना झालेली आढळणार नाही असे म्हणून शिंदे यांना “आपण स्वार्थत्यागरूपी अमृतवल्लीचा जोमदार रोपा त्या जागेत लावल्यामुळेच आपण आम्हास फार आदरणीय झाला आहात. त्या रोप्याचा मोठा वृक्ष झाला पाहिजे. त्याची जोमदार कलमे जिकडेतिकडे लावून त्यांचेही मोठे वृक्ष झाले पाहिजेत.” असे म्हटले आहे. पुढे आपल्या उदाहरणाच्या योगे आम्हा तरुणांमध्ये स्वार्थत्यागाची आवड उत्पन्न कराल अशी आशा प्रकट केली आहे.

प्रस्तुत अनावृत पत्रामध्ये शिंदे यांनी धर्मप्रचार कार्यासाठी जो अपूर्व स्वार्थत्याग केला त्याची यथार्थ जाण दाखविली आहे. आमच्या या बागेमध्ये स्वार्थत्यागारूपी अमृतवल्लीचा रोपा औषधालाही सापडावयाचा नाही. आजपर्यंत त्या अमृतवल्लीचा रोपा लावण्याचा कुणी प्रयत्न केला नाही तो आपण केला, म्हणून आपले अभिनंदन करणे हे पत्रलेखकास आपले कर्तव्य वाटले. आपले स्वीकृत कार्य अत्यंत बिकट आहे हे नमूद करूनही बिकट प्रसंगीसुद्धा स्वीकृत कार्य करीत राहण्याची स्फूर्ती आपणास सदैव मिळो अशी पत्रलेखकाने अखेरीस प्रार्थना केलेली आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांना हिंदुस्थानात परत आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करावयाची होती ती म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज यांना भेटणे. शिंदे विलायतेहून निघण्यापूर्वी त्यांना महाराजांकडून पत्र आले होते की, स्वदेशी आल्यावर प्रथम त्यांना भेटावे. त्यानुसार ते लगोलग महाराजांना भेटण्यासाठी बडोद्यास गेले. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज यांची आदरपूर्वक भेट घेतली. त्या वेळी बडोद्यास महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यांसाठीच्या दिवसा चालणा-या चार प्राथमिक शाळा होत्या. त्या शिंदे यांनी तपासाव्यात व काही सूचना करावयाच्या असल्यास प्रत्यक्ष महाराजांना भेटून त्या समक्ष करावयास सांगितले. शाळातपासणीविषयी व्यवस्था करण्यास महाराजांनी विद्याधिका-यांना फर्माविले. शिंदे यांनी तत्परतेने या शाळा तपासल्या. सर्व शाळा जोरात चालल्या होत्या. तरीही अस्पृश्यवर्गातील मुलांसाठी केवळ शालेय शिक्षणाचे प्रयत्न कितीह सद्हेतुमूलक असले तरी अशा प्रयत्नांची मर्यादा ध्यानात आली. मराठी पाचवी अथवा इंग्रजी दुसरी किंवा तिसरीचे शिक्षण संपताच ही मुले शाळा बंद करून हिंडत असत. कारण त्यांना पुढे नोकरीधंद्यात वाव नसे. पुस्तकी शिक्षणामुळे ती आपल्या वडिलांचे हलके धंदे करण्यास नाखूष होती. आपल्या जातीचा पारंपरिक अशोभनीय धंदा करण्यापेक्षा आळसात दिवस काढणे ती पसंत करीत असत. मराठी सहावी पास झालेली काही महार मुले रस्त्यावरून रिकामटेकडेपणाने फिरत असतात हे स्वतः शिंदे यांनी पाहिले. प्रत्यक्ष भेटीत महाराजांनी यांना शाळांच्या तपासणीबाबत विचारले असता आपल्याला जाणवलेली वस्तुस्थिती महाराजांना त्यांनी सांगितली. ह्या शिकलेल्या मुलांच्या नोकरीविषयी काही सोय करता आली तर करावी असे सुचविले. ह्या मुलांना जर पुढे नोकरीत वाव मिळाला नाही तर त्यांच्या या शाळांची वाढ तर होणार नाहीच; उलट त्या कितपत चालू राहतील याबद्दल आपल्याला शंका वाटते असेही त्यांनी महाराजांच्या निदर्शनास आणले. महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्याने तुर्त ते शक्य नाही असे सांगितले. पण स्कॉलरशिपा देऊन पुढील शिक्षणाची सोय करता येईल असे ते म्हणाले.४

थोड्याच दिवसानंतर अस्पृश्यवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठ्या रकमांच्या स्कॉलरशिपची सोय महाराजांनी केली आहे असे वृत्तपत्रात शिंदे यांना वाचावयास मिळाले.

बडोद्याच्या या मुक्कामातच विठ्ठल रामजी शिंदे यांना एका बिकट प्रसंगाला तोंड द्यावे लागले. शिंदे बडोद्याला येत आहेत हे समजल्यानंतर शहरातील प्रमुख मंडळींनी त्यांचे स्वागत करण्यासाठी पानसुपारीचा एक जाहीर समारंभ करण्याचे ठरविले. श्री. खासेराव जाधव यांचा या बाबतीत पुढाकार होता. समारंभामध्ये एकामागून एक जी वक्त्यांची भाषणे झाली त्यामधून प्रतिकूल सूरच निघू लागले. शिंदे यांचे सर्व शिक्षण मराठा समाजाच्या खर्चातून झाले आहे, विलायेतेला जाण्यायेण्याचा खर्चही महाराजांकडून मिळाला आहे असे असता हे मराठा समाजाच्या सेवेला हजर न होता प्रार्थनासमाजात शिरले हे बरे केले नाही, अशा प्रकारची भाषणे करून शिंदे यांच्या गळ्यात जेव्हा माळ घालावयास मंडळी पुढे आली तेव्हा त्यांनी म्हटले, “असे जर आहे तर मी ही माळ घालण्यास लायक नाही. म्हणून मी हातातच घेत आहे. प्रार्थनासमाज सर्वांसाठी आहे आणि त्यासाठी मला तयार केले हे मराठ्यांस, विशेषतः महाराजांना भूषणावहच आहे. स्वतः महाराज हेच जर केवळ मराठ्यांकरिता नाहीत तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊ?”५ शिंदे हे मुळातच जातिभेदातील अशा कौटुंबिक संस्कारात वाढले होते. आता तर ते केवळ जातीच्या, पारंपारिक धर्माच्या पलीकडे असलेल्या एकेश्वरी उदार विश्वधर्माचे पाईक बनलेले होते. बडोदेकर मराठा मंडळींना त्यांनी अश प्रकारचे उत्तर देणे त्यांच्या वृत्तीशी आणि भूमिकेशी सुसंगत होते. ह्या उत्तरातून विठ्ठलराव शिंदे संतुष्ट असले पाहिजेत. श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्याविषयी त्यांना अतीव आदर होता. महाराजांचे केवळ आर्थिक साह्यच त्यांना मिळाले होते असे नव्हे, तर पत्करलेल्या धर्मकार्यासाठी त्यांच्याकडून प्रोत्साहनही मिळाले होते. या भेटीत शिंदे यांना त्यांच्याबद्दलही कृतज्ञता प्रकट करता आली असणार आणि दुसरे, अस्पृश्य मुलांसाठी असलेल्या शाळा तपासण्याचे काम त्यांना करता आले. आयुष्यात त्यांनी महत्त्वाच्या मानलेल्या दुस-या एका कार्याचा प्रारंभही अशा प्रकारे झाला होता.

बडोद्याहून आल्यानंतर मुंबई प्रार्थनासमाजातील वडीलधा-या स्नेही मंडळींच्या आणि तरुण मित्रांच्या गाठीभेटी घेण्यात, चर्चा करण्यात शिंदे यांचे चार-सहा दिवस गेले. आपल्या वृद्ध, प्रेमळ मातापित्यांना भेटण्यास ते स्वाभाविकपणे उत्सुक असणार. मुंबईहून ते जमखंडीस गेले. त्यांच्या सहवासात काही दिवस राहून ऑक्टोबरच्या २७ तारखेस कोल्हापुरास आले. कोल्हापूरून लिहून आलेल्या व सुबोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या शिंदे यांच्याबद्दलच्या मजकुरावरून त्यांच्या ठिकाणी धर्मप्रचाराची तळमळ किती उत्कट होती, त्यांचा उत्साह किती दांडगा होता व कामाचा झपाटाही कसा वेगवान होता याची कल्पना येते. त्यात म्हटले आहे, “इंग्लंडहून येऊन १०/१५ दिवस झाले नाहीत तोच इकडे कोल्हापुरात हिंदुस्थानातील आपल्या धर्मप्रचाराच्या कार्यास त्यांनी सुरुवात केली असे म्हणावयास हरकत नाही. येथे असताना तीन-चार दिवसांत आपल्या मित्रमंडळींबरोबर बोलण्यास त्यांना ब्राह्मसमाजाशिवाय दुसरा विषयच नव्हता."६

कोल्हापुरातील तीन-चार दिवसांच्या मुक्कामातील पहिल्या रात्री राजारामीय क्लबमध्ये त्यांना निमंत्रित केले होते, तेथे जमलेल्या विद्वान मंडळींशी त्यांनी संभाषण केले. दुसरे दिवशी नेटिव्ह जनरल लायब्ररीमध्ये ‘धर्माचे शुद्ध स्वरूप’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानात प्रत्येक धर्माचे मूळ स्वरूप अत्यंत शुद्ध असून परिस्थितीप्रमाणे त्यांचे स्वरूप अशुद्ध कसे होत जाते ते दाखवून दिले. तसेच हल्ली शुद्ध धर्माची स्थापना होण्यासाठी सुधारलेल्या जगात त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज यांसारख्या संस्थांचे जे प्रयत्न चालले आहेत त्यांची माहिती देऊन सांगितलेल्या गोष्टींविषयी कळकळीने विचार करण्याची विनंती केली. तिस-या दिवशी उपासना चालवली. उपदेशासाठी तुकारामांचा ‘धाई अंतरिच्या सुखे। काय बडबड वाचा मुखे।‘ हा अभंग घेतला होता.

पत्रलेखकाने अखेरीस शिंदे यांच्या ठिकाणी आरंभीचा उत्साह असल्यामुळे काम झपाट्याने करण्याची उमेदही जबर आहे असा अभिप्राय प्रकट करून “तथापि त्या उमेदीमध्ये आपल्या प्रकृतीची हयगय न होऊ देण्याबद्दल त्यांस विनंती केल्याशिवाय राहवत नाही” असे अगत्यपूर्वक म्हटले आहे.

शिंदे यांच्या ठिकाणी धर्मप्रचाराचे काम करण्याचा उत्साह व काम झपाट्याने करण्याची उमेद जबरदस्त आहे असे जे म्हटले ते अगदी सार्थ होते. त्यांनी पुढील काळात मुंबई प्रार्थनासमाजाचे व अखिल भारतीय पातळीवर जे कार्य विविध प्रकारे केले ते पाहता ह्या अभिप्रायाची सत्यता पटते. कोल्हापूरहून निघून शिंदे हे साता-यास १ तारखेस पहाटे ४ वाजता पोहोचले आणि आधी ठरल्याप्रमाणे प्रार्थनासमाजामध्ये सकाळी ८ ते १० उपासना चालविल्या. सातारा प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत ज्येष्ठ सभासद सीतारामपंत जव्हेरे यांनी त्यांना निमंत्रित केले होते. सातारा येथील उपासनेचा विशेष म्हणजे अंत्यजादी जातींचीही बरीच मंडळी जमली होती. उद्बोधन, स्तवन, प्रार्थना हा उपक्रम पद्धतशीरपणे झाल्यानंतर तुकाराममहाराजांच्या ‘बुद्धि झाली साह्य परि नाही बळ । अवलोकितो जळ वाहे नेत्री।' ह्या अभंगाच्या आधारे अखेरीस उपदेश केला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रा. ब. काळे यांच्या घरी संगतसभेप्रमाणे काही वेळ धार्मिक विषयाचे विवेचन झाले. त्यानंतर सातार युनियन क्लबमध्ये ठरल्याप्रमाणे साडेसहा ते साडेसात शिंदे यांचे भाषण झाले. श्रोतृवर्ग दीडेशेपेक्षाही जास्त होता. क्लबच्या धोरणानुसार अंत्यजादिक मानलेल्या मंडळींनाही निमंत्रण होते. व्याख्यान सगळ्यांना मनोवेधक वाटले. अध्यक्ष रावबहादूर नाडकर्णी यांनी व्याख्यात्याची प्रशंसा केली. रा. जव्हेरे यांनीही व्याख्यात्यांची साधी वागणूक वगैरे गुणांची प्रशंसा केली. सोमवारी दुपार होऊनही शिंदे उत्साहाने कार्यक्रमात भाग घेत होते. ४ ते ६ पर्यंत शहरातील रा. चिरमुले, रा. काळे, डॉ. बासू, रावबहादूर जोशी वगैरे मंडळींसमवेत वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा, संवाद झाले. संध्याकाळी सव्वासहा ते साडेसातपर्यंत एका अंत्यजाच्या घरी त्यांनी उपासना चालविली व उपदेश केला. बायका-मुलांसह सुमारे पन्नाससाठ अंत्यजादिक मंडळी उपस्थित होती. उदार धर्माच्या तत्त्वाचे यथार्थ परिपालन शिंदे यांच्या कार्यक्रमामधून दिसून येते. कोल्हापूरच्या पत्रलेखकाने नमूद केल्याप्रमाणे शिंदे यांच्या ठायी असलेला उत्साह व झपाट्याने काम करण्याची प्रचंड उमेद याचा पडताळा त्यांच्या कार्यकालाच्या प्रारंभापासून मिळत राहिला.

जमखंडी येथे जाऊन आई-वडिलांना भेटून व कोल्हापूर, सातारा येथील दौरा आटोपून ४ नोव्हेंबरच्या सुमारास विठ्ठलराव मुंबईस परतले. रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रार्थनामंदिरात ‘कर्मयोग’ या विषयावर धर्मपर व्याख्यान दिले.७ भगद्गीतेतील ‘यस्त्विन्द्रियाणि मनसा’ हा भगवद्गीतेली तिस-या अध्यायातील श्लोक व तुकाराममहाराजांच्या ‘प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी’ या अभंगाचे सूत्र घेऊन त्यांनी सखोल तसेच सुलभ विवेचन केले. ज्ञानानंतर म्हणजे यथार्थ ज्ञानानंतर दोन प्रकारची म्हणजे वेदांतांची व भक्तांची नैष्कर्म्य वृत्ती कशी निर्माण होते ह्याचे सुलभ दृष्टांताधारे विवरण केले. “ज्ञानयोग साधून संसारातून उठावे आणि प्रकृतीचे दास्य करावे की कर्मयोग साधून ईश्वराचे मित्र होऊन पृथ्वीवर स्वर्ग आणावा ह्या दोन भागांपैकी हा कर्मयोग साधणे आमच्या समाजाचा धर्म आहे. संसारात आनंदाने राहणे आणि तदंगभूत कौटुंबिक, सामाजिक, राजकीय इत्यादी जी अनेक सत्कर्मे असतील ती केवळ जडहित साधण्याच्या हेतूनेच नव्हे तर ईश्वरी योजना असे समजून, त्याची सेवा जाणूनबुजून करणे म्हणजे वरील कर्मयोग होय. अशा प्रकारे कर्मयोगाचे त्यांनी विवरण केले. प्रार्थनासमाजातील या अगदी प्रारंभिक व्याख्यानात त्यांनी संसारत राहून जी कर्मे करावयाची त्यामध्ये कौटुंबिक कर्माबरोबर सामाजिक, राजकीय सत्कर्मांचा निर्देश केला होता. शिंदे यांची स्वतःची धारणाही अशीच बनलेली होती. प्रार्थनासमाजाने धार्मिक अंगाच्या जोडीने सामाजिक कार्याला प्रत्यक्ष आरंभ केला होताच. राजकारणही त्यांना वर्ज्य नव्हते.
 
शिंदे यांची धर्मप्रचारक म्हणून औपचारिक नेमणूक अद्याप व्हावयाची होती. न्यायमूर्ती चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रार्थनासमाजाची साधारण सभा १५ नोव्हेंबर १९०३ रोजी झाली व तीमध्ये शिंदे यांना सर्वानुमते समाजाचे धर्मप्रचार नेमण्याचे ठरले.८

शिंदे यांनी धर्मप्रचारकाच्या कार्याला आधीच आरंभ केला होता. आपल्या अंतःप्रेरणेने त्यांनी धर्मकार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला होता. औपचारिक नेमणुकीची ते थोडीच वाट पाहणार?

संदर्भ
१.    होळकर ह्या नावानेही पद्यरचना श्री. आत्माराम सदाशिव केळकर यांनी केलेली आहे, अशी माहिती श्री. बी. बी. केसकर यांच्या हस्तलिखित टिपणात आहे. आत्मारामपंत हे सदाशिवराव केळकरांचे चिरंजीव. ह्यावेळी केळकर कुटुंबीयांचे वास्तव्य इंदुरास होते. म्हणून होळकर हे टोपण नाव. शिंदे यांची कगदपत्रे.
२.    बी. बी. केसकर यांचे हस्तलिखित टिपण, शिंदे यांची कागदपत्रे.
३.    सुबोधपत्रिका, ११ ऑक्टोबर १९०३. हे अनावृत्त पत्र एका तरुण सभासदाकडून आलेले म्हणून छापलेले आहे.
४.    वि. रा. शिंदे, ‘इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस’, सुबोधपत्रिका, १७ डिसेंबर १९०५.
५.    विठ्ठल रामजी शिंद, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १८९.
६.    सुबोधपत्रिका, नोव्हेंबर १९०३.
७.    तत्रैव, १५ नोव्हेंबर १९०३.
८.    तत्रैव, २२ नोव्हेंबर १९०३.

सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व

विठ्ठल रामजी शिंदे हे मिशनच्या दगदगीच्या कामातून निवृत्त झाले होते. मात्र त्यांच्या आस्थेचे अनेक प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. धर्मकार्य ही तर त्यांची जीवननिष्ठा होती. मंगलोरहून परत आल्यावर पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळाच्या कार्याला त्यांनी चालना दिली. १९२९ साली ब्राह्मसमाजाच्या शतसावंत्सरिक उत्सवनिमित्त त्यांनी मोठाच प्रचारदौरा काढला व उत्तरेकडील मोठा प्रवास संपवून ते परत आले. १९३०च्या आरंभीच्या काळात देशातील वातावरण बदलून गेले होते. म. गांधींच्या नेतृत्वाने सर्व हिंदुस्थानात एक प्रकारे चैतन्याचे वारे खेळत होते व भारतीय समाज स्वातंत्र्याच्या आकांक्षेने प्रभावित झाला होता. म. गांधींचे द. आफ्रिकेतील कार्य जेव्हापासून प्रकाशात येऊ लागले तेव्हापासून शिंदे म. गांधीच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. गांधींच्या राजकारणाला धर्माचे अधिष्ठान आहे ही गोष्ट त्यांच्यामध्ये इतर राजकारण्यांहून वेगळी व अपूर्व आहे असे शिंदे यांना वाटत होते. ह्या कारणाने म. गांधीबद्दल त्यांच्या मनात नितांत आदराची भावना निर्माण झाली होती व ते म. गांधींना आजपर्यंत जगात निर्माण झालेल्या लोकोत्तर विभूतींपैकी मानू लागले होते. म. गांधीबद्दलची ही आदराची भूमिका त्यांच्या लेखनामधून, व्याख्यानांतून स्पष्टपणे जाहीर होऊ लागली होती. १९३० च्या प्रारंभी गांधीच्या प्रभावाने हिंदुस्थानातील वातावरण बदलले असतानाच स्वत: विठ्ठल रामजी शिंदे कृतिशील राजकारणात ओढले जावेत अशा प्रकारची घटना घडली.


पुणे शहर सत्याग्रही मंडळाधिकारी
दे. भ. बाळूकाका कानिटकर व हरिभाऊ फाटक यांनी विठ्ठल रामजींची मार्च १९३० मध्ये भेट घेतली व एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील कायदेभंग चळवळीचे त्यांनी नेतृत्व करावे अशी विनंती केली.१ ह्या प्रकारच्या कामाला शिंदे यांच्या मनाची सर्वथैव अनुकूलताच होती. कानिटकर, फाटक यांची विनंती शिंदे यांनी मान्य केली. विठ्ठल रामजी शिंदे यांचा प्रभाव आणि देशातील राजकीय परिस्थितीचा बदललेला देखावा याचा परिणाम होऊन केशवराव जेधे हे काँग्रेसच्या राजकारणाला अनुकूल झाले होते. सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्याकडे असलेला त्यांचा ओढा कमी झालेला होता वक काँग्रेसच्या राजकारणाकडे ते आकृष्ट झाले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच्या चळवळीत केशवराव जेधे यांनीही सामील व्हावयाचे ठरवले  त्याप्रमाणे ते झालेही.


पुणे जिल्ह्यातील खेडोपाडी पायी दौरा करुन लोकांमध्ये जागृती करणे व अखेरीस मिठाचा सत्याग्रह करणे असे या चळवळीचे स्वरुप होते.


अण्णासाहेब शिंदे यांनी एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवड्यात सोमवारी सकाळपासून आपला पहिला दौरा हवेली तालुक्यात काढायचे ठरवले. त्यांच्याबरोबर दहा-पंधरा स्वयंसेवकांची तुकडी होती. बरोबर प्रो. धर्मानंद कोसंबी व केसवराव जेधे होते. दौ-यासाठी तुकडी जेव्हा निघत असे तेव्हा सत्याग्रहाचा मोठा झेंडा पथकाच्या अग्रभागी फडकत असे.

बाजाची पेटी, टाळ ही साधने पथकाबरोबर असत. त्याचप्रमाणे प्रभातफेरीच पद्यावली प्रत्येकाच्या हातात असे.

 

डफ-तुणतुण्यासहित पोवाडेवाल्यांचा एक ताफाही त्यांच्याबरोबर असायचा. खेडेगावात प्रचारदौरा काढण्याच्या दृष्टीनेच अनुरुप अशी ही सगळी सिद्धता शिंदे यांनी केली होती. खरे तर ब्राह्मधर्माच्या प्रचारार्थ शिंदे ज्या वेळेला खेडेगावात व अस्पृश्य वस्तीत फेरी काढत असत, तेच स्वरुप या सत्याग्रहाच्या दौ-यामध्ये त्यांनी ठेवले होते.


फर्ग्युसन कॉलेज ही अण्णासाहेबांच्या दृष्टीने केवळ शिक्षणाच्या बाबतीतच मातृसंस्था होती असे नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने उदात्त कार्याचे ते एक पवित्र ठिकाणही होते. १९०९ साली मिशनचा पहिला त्रैवार्षिक बक्षीस समारंभ श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरातच साजरा केला होता. त्याप्रमाणे डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली १९९२ साली मिशनची ऐतिहासिक स्वरुपाची महाराष्ट्र परिषदही तेथेच भरविली होती. असा या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर येऊन त्यांच्या पथकाने प्रथम झेंडावदन केले व दापोडी गावास जाण्यासाठी कूच केले.


तेथून पुढे प्रत्येक खेडेगावात प्रथम प्रभातफेरी म्हणत उभ्या उभ्याच व्याख्याने देत ते पुढच्या गावी जात असत. ह्या सत्याग्रही पथकाचे स्वागत करण्याच्या बाबतीत खेडेगावच्या लोकांत अतिशय उत्साह दिसून येत होता. दोन प्रहरी एखाद्या गावी जेवणाचा बेत आधीच ठरलेला असे. स्नान वगैरे आटोपल्यावर जेवणास वेळ असल्यास पोवाडे सुरु होत.

चिचवड, देहू, आळंदी, लोणी, लोहगाव वगैरे लहान-मोठी सर्व गावे करुन पाहिल्या आठवड्यात बहुतेक हवेली तालुक्यातील प्रचारदौरा संपविला. या पहिल्या आठवड्यात जवळ जवळ शंभर मैलाचा पायी प्रवास झाला. दौ-याचा कार्यक्रम वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असे. पथकाच्या स्वागतार्थ बायकामुले झेड्यांची वाट पाहत हद्दीवर येऊन बसत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा दौरा इतका लोकप्रिय झाली की, एका गावचे लोक त्यांना निरोप देण्यासाठी गावाच्या हद्दीपर्यंत पोहोचवायला जात, तर दुस-या गावचे लोक स्वागतासाठी सामोरे येत.


ह्या काळात स्वातंत्र्याच्या आकांक्षेने सगळे वातावरण कसे भारुन गेले होते याचा निदर्शक हा एक प्रसंग पहिल्या आठवड्याचा हा दौरा संपवून शेवटचे खेडेगाव-लोहगाव-तेथून त्यांचे पथक येत होते. येरवड्याच तरुंग वाटेवरच होता. तुरुंगाच्या बाहेर उभे राहून पथकाने एक गाणे म्हटले.  झेंड्याचा जयजयकार झाला. त्यामध्ये कौद्यांनीही भाग घेतला व पोलीसही कौतुकाने पाहत होते.


येरवड्याजवळील धर्मशाळेत पथकाची उतरण्याची सोय केली होती. तेथे सहभोजन झाले. त्यामध्ये खेडेगावातील शिष्टमंडळीही सहभागी झाली. सायंकाळी पुण्यात प्रवेश करुन शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास हार घालून बुधवार चौकातून मिरवणुकीने सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिरात सर्वजण आले. तेथील सभेत शिंद्यांनी आपल्या आठवड्याच्या दौ-याचा वृत्तान्त सांगितला. हा दौरा म्हणजे धार्मिक वारक-यांची एक दिंडीच बनलेली होती. कारण त्यांचे नेतृत्व हे राजकारणाकडेही धर्मनिष्ठ वृत्तीने बघणा-या विठ्ठल रामजींकडे होते. भल्या पहाटे उठून साडेपाच वाजता सर्वजण उपासनेस बसत. उपासनेच्या वेळीं शिंदे त्यांना पथकाची शिस्त, त्यांनी चालविलेल्या कार्याचे पावित्र्य आणि जबाबदारी, अनत्याचार आणि सहनशीलता यांचे महत्त्व समजावून सांगत असत. शिंद्यांचा उपदेश हा केवळ शिस्तीच्या पालनासाठी नव्हता, तर राजकारणात आवश्यक असलेल्या नैतिक आचरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.


अण्णासाहेबांनी दुसरा दौरा खेड तालुक्यामध्ये काढला. यावेळी पथकात वीस स्वयंसेवक होते. मंचर, जुन्नर, नारायणगाव वगैरे खेड्यांतून दौ-याचे मोठ्या थाटाने स्वागत झाले. ह्या दौ-यात प्रथम मीठ विकण्याचा कायदेभंग सुरु केला. दांडी येथून मिठाची मडकी आणली होती. त्याला गांधीमीठ असेही म्हणण्यात येत असे. केव्हा केव्हा मिठाचा लिलाव होऊन पैसे जम. स्वयंसेवक कॅप्टन कृष्णाराव महादेव काळे हे तडफदार तरुण होते. गाडगीळ व लिमये ही दोन मुले बहारदार पोवाडे म्हणत, असे त्यांनी नमूद केले आहे.


उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही ठिकाणी जत्रा भरलेल्या होत्या. याचा फायदा दौ-याला झाला. सभेतील व्य़ाख्यान झाल्यावर विदेशी कापडाची होळी होत असे. मात्र त्या वेळी कोणावरही जुलूम होणार नाही याची दक्षता घेतली जाई. काही सरकारी अधिका-यांची मुले आपल्या वडिलांच्या देखत आपल्या डोक्यावरच्या किमती विदेशी टोप्या होळीत फेकीत असत. सभेला पाचृसात हजारांचा जमाव जमत असे. लोकांना जणू काय या दौ-याचे वेडच लागले होते.


तिसरा दौरा भीमाशंकर व त्यापलीकडील गावी निघाला. ह्या बाजूला कोळ्यांची वस्ती विशेष प्रमाणात होती. त्यांना दारु न पिणे, चोरी न करणे, अत्याचार न करणे वगैरे सात्त्विक तत्त्वे समजावून सांगणे कठीण गेले. एक-दोन ठिकाणी सभेमध्ये ज्या वेळेला अस्पृश्यांना वेगळे बसविल्याचे शिंदे यांना दिसून आले त्या वेळी पथकाने आपले ठाणे अस्पृश्य जमावात नेले व अस्पृश्येतरांनाच वेगळे ठेवले. अस्पृश्यता मोडण्याचे असे प्रात्यक्षिक फारच परिणामकारक होते. दौ-यामधील व्याख्यानांतून समतोल स्वरुपाची शिकवण सांगितली जात असे. सरकारचा द्वेष करावा असे कधीच सांगितले गेले नाही. सरकारचे पुष्कळ कायदे आपल्या हिताचेच आहेत, ते अवश्य पाळावे असे सांगितले जाई. जे कायदे प्रजेच्या हिताचे नसतात व जे प्रजेच्या विरोधात न जुमानता केलेले असतात असेच कायदे पाळू नयेत, असे प्रतिपादन दौ-यामधून केले जात असे.


दौ-याचे स्वरुप चैतन्यदायी होते. आपला पहिला दौरा संपवून विठ्ठल शिंदे, धर्मानंद कोसंबी व केशवराव जेधे पथकासह पुण्यास परत आले. ह्या तिघांचीही सत्याग्रहाच्या दौ-यात आलेल्या अनुभवाचे कथन करण्यासाठी ता. १६ एप्रिल रोजी सायंकाळी पुण्याच्या शिवाजी मंदिरमध्ये सभा भरविण्यात आली. 'शांततामय स्वातंत्र्ययुद्धास मदत करा.', 'मिठाचा कायदा मोडा, मीठ तयार करा', 'गांधीमीठ विका', अशा पाट्या झळकवीत व महात्मा गांधीचा जयघोष करीत ते तिघे सत्याग्रही वीर शिवाजी मंदिरात पोहोचले. सभेला रा. ब. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. पुणे शहर सत्याग्रही मंडळाधिकारी बाळूकाका कानिटकर यांचे 'लाभेल त्याच काळा स्वातंत्र्य भारताला' हे पद झाल्यावर अध्यक्ष डोंगरे यांनी अण्णासाहेबांना भाषण करण्याची विनंती केली. शिंदे यांना दौ-याचे फारच श्रम झाले होते, त्यांचा आवाज बसला होता, तरीही त्यांनी ह्या प्रसंगी भाषण केले. "आपण या कामाला का पडलो, खेडेगावातच जाण्याचे कारण काय ह्याबद्दलची भूमिका मांडणे तसेच खेडेगावात आलेले अनुभव सांगणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे" त्यांनी म्हटले.

"अलीकडील पाच-दहा वर्षांत चळवळ करण्याबाबतीत आपण वस्तुत: निवृत्त झालो होतो. राष्ट्रीय चळवळीत पडण्यापूर्वी सर्वांनी म्हणजे-ब्राह्मण-अब्राह्मण यांनी-एक झाले पाहिजे व एका राष्ट्रीय पक्षात असावयास पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी शहर सोडून खेड्यात गेलो याचे कारण शहरातील सुशिक्षित लोकांची प्रवृत्ती खेडेगावाकडे नाही.

कलकल्ता, मद्रास वगैरे मोठ्या शहरांत सत्याग्रहाचा वणवा पेटला आहे. परंतु माझे मत वेगळे होते. ब्राम्हण विद्वान पंडित जागृत झाले आहेत. तरी नोकरशाहीच्या पोटाला चिमटा बसविणारा एकच वर्ग म्हणजे शेतकरी हे आहेत. (टाळ्या). पंचम जॉर्ज, पार्लमेंट, कोणीही दोषी नाही. नोकरशाही दोषी आहे. यांचा पगार २१,००० पासून खाली येण्याकरिता शेतकरी जागे झाले पाहिजेत. शेतकरी खरे मालक आहेत. नोकरशाहीला पगार देण्याला तेच समर्थ आहेत.... शेतक-यांना भेटायला आम्ही मोटारीतून जाऊ नये. पायी गेले पाहिजे.

मोटारीतून गेल्यास त्यांना वाटते, कलेक्टर आला की काय! आम्ही त्यांच्यासारखे होऊन खेड्यातून, काट्यांतून गेलो, मिठाचा कायदेभंग ही सरकारला 'डेंजरस सेंटिमेंट' वाटते स्वातंत्र्याची भावनाही त्यांना 'डेंजरस' वाटते. म. गांधीची सक्त आज्ञा आहे की दोषयुक्त वर्तन कराल तर मी प्रायोपवेशन करीन, मात्र आम्हाला अन्यायाची चीड आली पाहिजे. पण शेतक-यांना राग कसा आणणार? जर शेतक-याला सांगितले की, सरकार तुमचे नोकर आहे तर त्यांना वाटणार मायबाप सरकार आमचे नोकर कसे होतील? त्यांची मन:सरणी पहावयास आम्ही तेथे गेलो. सरकार उत्तम प्रकारचे नोकर नाहीत, अशी त्यांची समजूत पाडावी, असा आम्ही प्रयत्न  केला.


"ह्या दौ-यात आम्ही एकंदर २६ गावे हिंडलो. ४० व्याख्याने झाली. सर्व प्रवास पायी केला. ह्या प्रवासात काही विशेष गोष्टी आढळल्या. एखाद्या वेळी खेडेगावात दूध मिळणे मुश्कील होऊन जाई. हे ऐकून तुम्हास आश्चर्य वाटेल. आम्हांस गुरे भेटली, पण दूध मात्र नाही. याचे कारण दूध शहराकडे. दूध, तूप पाहिजे असेल तर मुंबई, पुण्यासच राहिले पाहिजे; खेडेगावात मिळणे मुश्कील. दुसरी अडचण भाषेची. शेतक-यांची भाषा मराठी. आमची भाषा मराठी पण फरक इतका की, आमची सुधारलेली मराठी असल्याने त्यांना समजण्यास कठीण जाते. खेड्यांतील कुणब्यांची मराठी आम्हांस आली पाहिजे. आपणास इंग्रजी येत असल्यामुळे पूर्ण मराठी येत नाही.


"शेतक-याला कायद्याची भीती वाटते, तितकी दुष्काळाची, एखाद्या भुताचीसुद्धा वाटत नाही. खेड्यांत आणखी एक विशेष गोष्ट पाहण्यास येते. पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. खेड्यांत दुसरे साधन न राहिल्यामुळे हे पुरुष शहरांतून फॅक्टरीमध्ये कामाला गेलेले आढळले. पुण्यातील पंचक्रशीतील बरेच शेतकरी खडकीच्या दारुगोळ्याच्या फॅक्टरीत आहेत.
"आम्ही खेड्यांतून फिरत असता आणखी एक गोष्ट माझ्या नजरेस आली. एक खेड्यात-चिंचोळीला मराठ्यांच्या मुलाबरोबर महारांच्या मुलाला शाळेत घेतले जात नाही. त्यांच्या उलटही प्रकार दिसला. मराठ्यांजवळ महारांची मुले बसली होती.


"एकंदर आम्ही सतराजण अकरा गावी गेलो. येथील विद्यार्थिवर्ग खेड्यापाड्यांतून फिरून येईल. तर त्यांना दिसेल की, खेड्यांतच खरे हिंदुस्थान भरले आहे. गांधींचे नाव खेडोपाडीसुद्धा माहीत आहे. गावची मुले आमच्यामागे लागून 'गांधीजी की जय' ओरडत. एक खेड्यात तर एकाने आम्हांस विचारले, गांधींचे मीठ आणले आहे काय? हा प्रश्न विचारणारा मारवाड्याचा मुलगा होता. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. तेथील त्या उंच उंच भिंती, पोलीस सार्जेंट. त्यांच्यासमोर तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला. इतक्यात मिलिटरी ऑफिसर येऊन प्रथम झेंड्याला सलामी करुन म्हणाला, "परेड चालली आहे, गाणे बंद करा." समोरून कैद्यांचा एक तांडा येत होता, त्यांच्यासमोर म. गांधी की जय म्हणताच आतील दोन हजार कैदी म. गांधी की जय करु लागले." व्याख्यानाच्या शेवटी अण्णासाहेबांनी आणखी एक चित्तवेधक घटना सांगितली. "पुढे जाताना येरवड्यास एक तमाशा सुरु होता. मी प्रथम तेथे गेलो. मी तेथे जाताच एकाने मला म्हटले पुढे बसू नका. त्याला वाटले की मी तमाशा बघण्यास आलो आहे. मी सांगितले की मी एकटाच नसून आमची आणखी पंधरा माणसे यावयाची आहेत. आम्ही गांधींचा निरोप तुम्हास सांगावयास आलो आहे. हे सांगताच सर्व मंडळी तो तमाशा सोडून आमचा निरोप ऐकण्यास येऊन उभी राहिली. त्याच कित्येक वडारी बायकासुद्धा येऊन उभ्या राहिल्या. याप्रमाणे कार्य करुन परत आता येथे आलो आहोत."


शिंदे यांनी जागृतीचे कार्य खेडेगावांतील शेतक-यांतच करणे कसे आवश्यक आहे हे प्रारंभी सांगितले. आपल्या भाषणातून म. गांधीची अनत्याचारी सत्याग्रहाची भूमिका कोणत्या पायावर उभी आहे, याबद्दलचा संदेश खेडेगावातील लोकांपर्यंत आपण कसा पोहोचविला याचे कथन केलेच, पण खेडेगावांतील वातावरणसुद्धा म. गांधींच्या प्रभावाने कसे भारले होते याचे यथातथ्य चित्र उभे केले.


प्रो. धर्मानंद कोसंबीनी आपल्या भाषणात तरुणांना सांगितले की, " एक वर्ष तुम्ही शाळा सोडली तरी चालेल पण बाळूकाकाच्या पथकात नाव नोंदवून खेडेगावची सफर करा." केशवराव जेधे म्हणाले, "आम्ही म. फुले पथक काढणार आहोत, ब्राह्मणेतर सत्याग्रहात सामील होण्यास तयार आहेत. आम्ही या चळवळीविरुद्ध नाही. स्वराज्य अज्ञजनाकरिता पाहिजे. शेतकरी लोकांकरिता पाहिजे. आम्ही लोकगावच्या म्हारवाड्यात गेलो. तेथे त्यांना उपदेश केला, की ही चळवळ तुमच्या हिताकरिता आहे. गुरुवर्य शिंदे, प्रो.कोसंबी हे तुरुंगात जाण्यास तयार आहेत. मी मराठा आहे हे विसरुन अस्पृश्यांकरिता या मडळीस सामील झालो. ब्राह्मणेतर सत्याग्रहात भाग घेण्यासाठी तयारच आहेत," सभेच्या शेवटी बाळूकाका कानिटकरांनी साकल्याने सत्याग्रहाबद्दलची माहिती सांगितली व "तारीख १७ला संध्याकाळी पेण व मालवण येथे दोन पथके रवाना होत असून त्यामध्ये दोन मुसलमान बोहरी दाखल झाले आहेत," हे सांगून गांधींच्या "या सत्याग्रहास मुसलमानांची सहानुभूती नाही" हा टाइम्सकाराचा आरोप खोटा असल्याचे प्रतिपादिले. हिंदू, मुसलमान, अस्पृश्य, शहरी लोक आणि खेडेगावांतील शेतकरी ह्या सर्वांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव व एकोप्याची भावना जागृत झाल्याचे ह्या सत्याग्रहाच्या रुपाने दिसून आले.


केशवराव जेधे आपल्या भाषणात म्हणाले होते की, "गुरुवर्य़ शिंदे, प्रो. कोसंबी तुरुंगात जाण्यास तयार आहेत." दोघांपैकी निदान शिंदे यांच्याबाबतचे जेध्यांचे भाकीत खरे ठरले. तीन आठवड्यांनंतर शिंदे यांना १२ मे रोजी तुरुंगाच्या दारातून आत प्रवेश करावा लागला.


पुणे जिल्ह्यातील सत्याग्रह चळवळीला नेतृत्व देऊन व तीमध्ये सहभागी होऊन राजकीय चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान देऊन तिचे कसे उन्नयन करता येते याचा एक आदर्श वस्तुपाठच अण्णासाहेब शिंदे यांनी दिला असे म्हणता येते. महात्मा गांधींचे ते खरेखुरे समानधर्मी होते याचा उत्तम प्रत्ययही आपल्याला या निमित्ताने येतो.

शेतकरी चळवळ

शेतकरीवर्गाची हलाखीची स्थिती कशी सुधारावी हा एक विठ्ठल राजमी शिंदे यांच्या उत्तरकालीन कार्यातील प्रमुख कळकळीचा विषय होता. १९२६ ते ३२ या कालखंडात शेतक-यांच्या सभा भरवून, परिषदांमध्ये भाषणे करुन यांच्यामध्ये जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. ते स्वत: शेतकरीवर्गातीलच होते. जमखंडी येथे गरीब शेतक-यांची स्थिती किती हलाखीची असते याची त्यांनी लहानपणी केवळ निरीक्षणच केले होते असे नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवही घेतला होता. शेतकरीवर्गाबद्दल स्वाभाविक आस्था असल्यामुळे ते युरोपमध्ये गेले असता इंग्लंडमधील शेतकरीवर्गाची स्थिती कशी आहे, त्याचप्रमाणे फ्रान्स व स्वित्झर्लंडमधील शेतीची आणि शेतकरीवर्गाची अवस्था काय आहे याचे त्यांनी आस्थेवाईकपणे निरीक्षण केले होते; चौकशी केली होती. १९२० साली ज्या वेळेला शिंदे यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले त्या वेळी बहुजनपक्ष ह्या नावाने त्यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यामध्ये एक पीडित-शोषितवर्ग म्हणून शेतकरीवर्गाच्या दारुण अवस्थेचा निर्देश करुन आपला पक्ष त्यांचा कैवार घेणार असे आश्वासन दिले होते.


वस्तुतः १९२६ ते १९३२ हा कालखंड स्वातंत्र्यलढ्याच्या उत्कट प्रेरणेने भारलेला होता. स्वतः अण्णासाहेब शिंदे यांनीही त्यात भाग घेऊन १९३० साली तुरुंगवासही पत्करला होता. तरीही या काळात शेतक-यांच्या ख-याखु-या हिताची वस्तुनिष्ठ भूमिका त्यांनी मांडली आहे. ही भूमिका मांडीत असताना स्वातंत्र्यलढ्यामध्ये अग्रेसर असणा-या काँग्रेस पक्षाच्या शेतक-यांच्या भूमिकेबाबत असलेल्या उणिवांचाही मार्मिकपणे निर्देश केला आहे. शेतक-यांना त्यांच्या वास्तवस्थितीची कल्पना देऊन त्यांचे शत्रू कोण कोण आहेत याचे यथोयोग्य विश्लेषण त्यांनी केले आहे. शिंदे यांनी शेतक-याच्या चळवळीमध्ये हा जो मनःपूर्वक सहभाग घेतला त्यातून शेतक-यांच्या हिताबद्दल त्यांना असलेली आंतरिक तळमळ दिसून येते.


अस्पृश्यांची शेतकी परिषद (१९२६, पुणे), मुंबई इलाखा शेतकरी परिषद ( १९२८, पुणे ) वाळवे तालुका शेतकरी परिषद ( १९३१, बोरगाव ), संस्थांनी शेतकरी परिषद ( १९३२, तेरदाळ ) व चांदवड तालुका शेतकरी परिषद ( १९३२, वडणेर ) या पाच परिषदांमध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी भाग घेऊन शेतक-यांमध्ये जागृती करण्याचे मोलाचे काम केले.


३० ऑक्टोबर १९२६ रोजी पुणे येथे झालेल्या अस्पृश्यांच्या शेतकी परिषदेचे ते अध्यक्ष होते. सरकारने भरविलेल्या शेतकी प्रदर्शनाच्या जोडीनेच ही अस्पृश्यांची शेतकी परिषद भरविण्यात आली होती. या अस्पृश्यांच्या शेतकी परिषदेच्या हेतूबद्दल त्यांनी साशंकता प्रकट केली, कारण जमिनीचे मालक अथवा शेती कसणारे ह्यांपैकी कोणत्याही नात्याने अस्पृश्यांची गणना शेतीसंबंधीच्या वर्गामध्ये करता येत नाही; एवढेच नव्हे तर, त्यांची गणना शेतमजुरांमध्येसुद्धा होत नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. इतर इलाख्यात समाजाची स्थिती शेतीवरच्या बिनमुदतीच्या गुलामासारखीचआहे असे नमूद करुन अस्पृश्याला शेतकरी म्हणणे त्याच्या दु:खावर डागण्या देण्यासारखे आहे, असे त्यांनी विदान केले. अस्पृश्यांचा मूलतः प्रश्न सामाजिक-धार्मिक व विशेषतः राजकीय स्वरुपाचा आहे असे त्यांनी सांगितले. मात्र इतर प्रांतातल्यापेक्षा महाराष्ट्रात अस्पृश्यांची जमीनमालकी संबंधी स्थिती किंचित बरी आहे असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. वस्तुतः अस्पृश्य हे दंडकारण्याचे मूळ मालक होत ही जाणीव त्यांना देऊन "तुम्ही सर्वांनी एकी करुन जमिनीवरील गेलेली सत्ता मिळविली पाहिजे." असे त्यांना आवाहन केले.


पेशवाईच्या काळात महाराष्ट्रातील शेतकरी मोठा सुखी होता अशातला भाग नव्हता. परंतु ब्रिटिशांच्या राजवटीत शेतक-यांचे शोषण कायद्याचा आधार देऊन पद्धतशीरपणे करण्यात येऊ लागले. इंग्रज सरकारने केलेले शेतक-यांच्या संबंधीचे कायदे शेतक-यांच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी त्यांच्या दुर्दशेला कारणीभूत ठरले. ब्रिटिशांनी शेतसारा आकारण्याची नवीन पद्धती स्वीकारल्यामुळे ग्रामीण जीवनाचे चित्र १८१८ नंतर बदलले. प्रत्यक्ष पिकाऐवजी जमिनीचा कस ध्यानात घेऊन शेतसारा वसूल करण्याची कायमधा-याची पद्धती त्यांनी सुरु केली होती. शेतामध्ये चांगले पीक आलेले नसतानासुद्धा शेतसारा देण्याची जबाबदारी व्यक्तिश: शेतक-यावर असे; त्यामुले शेतसारा चुकला करण्यासाठी अनेकदा शेतक-याला सावकारकडून कर्ज काढणे भाग पडत असे. मराठ्यांची सत्ता असताना खेड्यांतील सावकारांना व्याजाचा वाट्टेल तो दर लावण्याची मुभा दिलेली नव्हती. पण ब्रिटिशांच्या अंमलात मुभा दिल्यामुळे शेतकरी कर्जाच्या आणि व्याजाच्या ओझ्याखाली दडपून जाऊ लागला. न्यायालयाचा फायदा सावकारांना होत असे व अडाणी शेतक-यांचे शोषण अधिक प्रमाणात होऊ लागले.


मराठ्यांच्या अंमलात शेतक-यांनी जमीन विकता येत नसे, पण ब्रिटिश अंमलात शेतजमीन विकण्याची परवानगी असल्यामुळे कर्जबाजारी शेतकरी शेवटी स्वतःच्या शेतीलाही मुकत असे. ब्रिटिश सरकारच्या ह्या धोरणाचा अडाणी शेतक-यांना लाभ तर होत नसेच, उलट तो संगमनत केलेल्या सावकार-वकिलांकडून भरडला जात असे. वेगवेगळे कायदे करुन शेतक-याचे शोषण करण्याची परंपरा विसाव्या शतकाच्या तिस-या दशकातही चालत होती. १९२८ साली मुंबई सरकारने तुकडेबंदीचे व सारावाढीचे बिल मजूर करुन घेण्याचा विचार चालविला होता तो असचा कायद्याच्या आधारावर शेतक-याची पिळवणूक करण्याचा हेतू असलेला होता.


मुंबई सरकारच्या ह्या संकल्पित बिलाला विरोध करण्याच्या हेतूने पुण्यात २५ व २६ जुलै १९२८ रोजी मुंबई इलाखा शेतकरी परिषद भरविण्यात आली. ह्या परिषदेला शिंदे यांनी यशस्वीपणे मार्गदर्शन केले. १९२६-२७ मध्ये गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी साराबंदीची अपूर्व चळवळ मुंबई सरकारच्या विरोधात चालविली व तिला यशही मिळवून दिले. या घटनेचा एक स्वाभाविक परिणाम म्हणजे मुंबई इलाख्यातील शेतक-यांमध्ये जोरदार जागृती झाली. अशा वेळी मुंबई सरकारने शेतक-याच्या हिताच्या नावाखाली पण वस्तुतः शेतक-यांवर अन्याय करणारे तुकडेबंदीचे व सारावाढीचे बिल आणले. ह्या बिलाच्या अन्वये शेतजमिनीच्या अत्यंत लहान वाटण्या करण्यावर बंदी घालण्याचा सरकारचा मनोदय होता. कायदेकौन्सिलातील महसूल खात्याचे दिवाण सर चुनीलाल मेहता ह्यांच्या प्रेरणेने ते बिल मुंबई कौन्सिलात आणले होते. मुंबई इलाख्यात व विशेषतः महाराष्ट्रात मालकीच्या जमिनीचे वारसाहक्काने इतके लहान लहान तुकडे पडत चालले होते की शेतक-यांच्या वैयक्तिक हिताच्या दृष्टीने तसेच राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शेतजमिनीचे इतके लहान तुकडे पडणे अनिष्ट होते. परंतु शेतक-यांचे हित हा मुंबई सरकारचा केवळ दाखविण्याचा भाग होता. कारण दुस-या बाजूने जमिनीचे मोठमोठे भाग मोठमोठ्या भांडवलदार मंडळींनी विकत घेऊन साखरेचे कारखाने संयुक्त भांडवलाच्या जोरावर चालविण्याचा उपक्रम सुरु केला होता. ह्या व्यापा-यांमध्ये परकीय भांडवलदारही बरेच होते. त्यामुळे सरकारच्या हेतूबद्दल लोकांच्या मनात रास्त शंका निर्माण झाली होती. सरकार आणू पाहत असलेले दुसरे बिल होते ते सारावाढीचे ह्या बिलामध्ये तर शेतक-यांवर उघड उघड अन्याय करुन आधीच गांजलेल्या शेतक-यांची पिळवणूक करुन सरकारी खजिना भरण्याचा हेतू स्पष्ट होता. १९२८ सालच्या पावसाळ्यात मुंबई सरकारच्या पुणे येथे होणा-या कौन्सिलच्या अधिवेशनात ही दोन्ही बिले तातडीने मंजूर करुन घेण्याचा सरकारचा उद्देश होता. सरकारचा हा उद्देश हाणून पाडण्याच्या इराद्याने पुणे येथील रे मार्केटमध्ये ही परिषद २५,२६ जुलै रोजी बोलाविण्यात आली.


ह्या परिषदेच्या निमित्ताने मुंबई इलाख्यातील शेतक-यांमध्ये अपूर्व जागृती झाली होती. परिषदेचे अध्यक्षस्थान विठ्ठल रामजी शिंदे यांना देण्याचे निश्चित केले होते. स्वागताध्यक्ष श्री. बाबुराव जेधे हे होते. परिषदेला महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून निरनिराळ्या जिल्ह्यांतून सुमारे पाच हजार शेतकरी आलेले होते. आलेल्या पुढा-यांमध्ये कर्नाटकाचे देशभक्त गंगाधरराव देशपांडे, मुंबईचे श्री.सिलम, ठाणे जिल्ह्यातील पालघरचे श्री. छोटालाल श्रॉफ, विरारचे श्री. गोविंदराव वर्तक, मुंबई कौन्सिलचे सभासद देशभक्त नरिमन, आमदार नवले, सिंधचे अमीन उमरावतीचे आनंदस्वामी व पुण्यातील तात्यासाहेब केळकर, विनायकराव भुस्कुटे, बाळूकाका कानिटकर, पोपटलाल शहा, श्रीपतराव शिंदे, दिनककराव जवळकर ही मंडळी होती. परिषदेसाठी मंडईतील भाजीवाल्या लोकांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. देशभक्त बाबुराव जेधे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जोरदारव कळकळीचे भाषण केले.


श्री. बाबुराव जेधे ह्यांनी आपल्या भाषणात विविध पक्षांतील मंडळी आपले मतभेद बाजूला ठेवून शेतक-यांच्या हिताने प्रेरित होऊन ह्या परिषदेत एकत्र आली हा मोठाच शुकशकुन आहे असे सांगितले. नियोजित अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "गुरुवर्य अण्णासाहेब शिंद्यांच्या कर्तबगारीचा कुतुबमिनार हा आपल्याच नव्हे तर भविष्यकालीन होणा-या हजारो पिढ्यांना दिसल्यावाचून राहणार नाही. मराठ्यातील कार्यशक्ती काय करु शकते, असा जर कोणी आपल्याला प्रश्न केला तर अण्णासाहेब शिंद्यांच्या कार्याकडे बोट करा. मराठ्यातील स्वार्थत्यागाचे विसाव्या शतकातील उदाहरण दाखविण्याचा जर आपल्यावर प्रसंग आला तर आपण अण्णासाहेब शिंद्यांचे नाव घ्या... परकीय सत्तेचा विध्वंस शिवाजीमहाराजांनी केला; वर्णवर्चस्वाचा विध्वंस शाहूमहाराजांनी केला व अस्पृश्यतेच्या विध्वसांचे कार्य करण्याकरिता तितक्याच धडाडीने अण्णासाहेबांनी आपले आयुष्य वेचले." अशा प्रकारे नियोजित अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांचा गौरवपर परिचय करुन दिल्यानंतर परिषदेपुढे असणा-या विचार करावयाच्या तीन विषयांचा त्यांनी निर्देश केला. दोन बिलाच्या जोडीनेच बार्डोली येथील करबंदीच्या चळवळीला पाठिंबा देणे हाही एक विषय सभेपुढील कामाचा म्हणून सांगितला व सरकारने आणलेली दोन नियोजित बिले कशी अन्यायकारक आहेत याचे थोडक्यात परंतु साधार व जोरकस प्रतिपादन केले. शेतकरी बंधूंना लढयासाठी कणखरपणे तयार राहा असे आवाहन करताना श्री. बाबुराव जेधे आपल्या भाषणाच्या अखेरीस म्हणाले, "वेळ पडली तर सत्याग्रहाला तयार झाले पाहिजे. सरकार फार झाले तर तुम्हाला तुरुंगात घालील. परंतु तथेच्या लोकांची तुमच्यापेक्षा चांगली स्थिती असल्यामुळे तुम्हाला भिण्याचे कारण नाही."


या प्रकारे उपरोधिक विधान करुन शेतकरी बंधू मोठ्या संख्येने परिषदेसाठी उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचे आभार मानले व परिषदेच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य अण्णासाहेब शिंदे यांनी योजना व्हावी अशी सूचना केली.


श्री. बाबुराव जेधे यांनी केलेल्या अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन देताना श्री. न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर म्हणाले, "ही इतकी शेतकरी मंडळी जमलेली पाहून मला अत्यंत आनंद वाटत आहे. अशा वेळी गुरुवर्य अण्णासाहेब शिंदे आपणास लाभले ही आनंदाची गोष्ट आहे. शिंदे यांचा स्वार्थत्याग आणि विद्वता अवर्णनीय आहे." श्री. केशवराव बागडे यांनीही शिंदे याच्याबद्दल आदर प्रकट करुन सुचनेला अनुमोदन दिले व टाळ्यांच्या प्रचंड गजरात अण्णासाहेब शिंदे अध्यक्षाच्या जागी स्थानापन्न झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या प्रारंभी अण्णासाहेब शिंदे यांनी अशा संकटाच्या आणि आणिबाणीच्या वेळी आपल्याला ह्या शेतक-यांच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून जो विश्वास प्रकट केला त्याबद्दल शेतकरी बांधवांचे आभार मानले. ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक उत्सवासाठी आपण कलकत्त्यास निघालो असताना हे निमंत्रण मिळाले. तिकडे जाणे स्थगित करुन आपण शेतक-यांच्या परिषदेसाठी जे आलो ते हे धर्मकार्य समजूनच, असेही अण्णासाहेबांनी सांगितले. जगातील एका अत्यंत बुद्धिवान, संपत्तिवान आणि पराक्रमी जातींच्या लोकांचे ह्या देशावर शंभर वर्षे राज्य असूनही नऊदशांश जनतेची केविलवाणी स्थिती असावी आणि इकडे ह्या राज्यकर्त्यांच्या टेकडीवरील हवाशीर राजवाड्यात नाचरंग, तमाशे ह्यांची झोड उठावी, ह्याबद्दल त्यांनी ब्रिटिशांच्या राजनीतीचा धिक्कार केला. हिंदुस्थानच्या प्रजाजनांचे आपण ट्रस्टी आहोत असा दावा करणा-या ब्रिटिश राज्यकर्त्यांचा त्यांनी उपहास केला. परकीय ट्रस्टी आणि स्वकीय मंत्री ह्यांच्या मिलाफामुळे येथील प्रजेची धडगत राहिली नसून त्यांची हवालदिल अवस्था झाली आहे असे सांगितले. शेतक-यांच्या दु:सह अवस्थेचे वर्णन करताना ते म्हणाले, "अज्ञान, दारिद्रय, आणि असहायतेच्या गाळात देशाचा ८३/१०० भाग रुतला असता, आम्ही थोडी शिकलेली मंडळी स्वराज्याच्या काय गप्पा मारीत बसलो आहोत? इंग्रजी आमदानीत गिरण्यागोद्या वगैरे मोठ्या भांडवलाचे धंदे सुरु झाल्याने खेड्यातील कसदार तरुणांचा ओघ शहराकडे वळला आहे. खेड्यात आणि कसब्यात लहान लहान भांडवलाचे मारवाडी ब्राह्मणादी, पांढरपेशा जातीचे लोक अडाणी शेतक-यास आपल्या सावकारी जाळ्यात गुंतवून त्यांच्या जमिनीचे आपण न करते मालक होऊन बसले आहेत आणि शेतकरीवर्ग आपल्याच शेतावर खंडदार होण्याचीही ऐपत न उरल्यामुळे मजूर बनत चालला आहे. सतत फरविला गेल्यामुळे त्याची स्वत:ची परंपरागत दानत आणि नीती बिघडून तो गावगुंड बनू लागला आहे. मी गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास ऐन हंगामाच्या दिवसात सांगली, जमखंडी संस्थानातील कृष्णा तटावरील गावांतून आणि खेड्यांतून एक महिना हिंडत होतो. हा भाग पिकांविषयी प्रसिद्ध आहे. परंतु खेडीच्या खेडी शेतकरी-मालकाच्या ताब्यातून स्वत: शेती न करणा-या उपटसूळ लोकांच्या ताब्यात गेलेली पाहून माझे हृदय फाटते." संस्थानात शेतक-यांच्या संरक्षणार्थ कायदे नाहीत ही बाब त्यांनी निदर्शनास आणली. महाराष्ट्रातील शेतक-यांचे आपल्या शेतावर किती उत्कट प्रेम असते हे सांगून प्रत्यक्ष बादशहानेदेखील आपल्या शेताकडे वाकड्या नजरेने बघितलेले शेतक-यास खपत नाही ही बाब उल्लेखून तुकडेबंदीच्या बिलाबाबत शेतकरी इंग्रज सरकारची गय करणार नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले. तुकडेबंदीचे बिल मांडणारे नामदार सर चुनीलाल मेहता यांनी अल्पोत्त्की करुन शेतक-यांच्या जमीनीचे तुकडे आपल्या टेबलाएवढे होऊ लागले आहेत, असे विधान केले होते. त्याचा उल्लेख करुन शिंदे उपहासाने म्हणाले, "नामदारांचे टेबल मोठे राक्षसी असले पाहिजे," मुंबईच्या टाइम्समधील एका चाणाक्ष लेखाचा हवाला देऊन शिंदे यांनी सरकारच्या तुकडेबंदीच्या बिलाच्या पाठीमागे असलेल्या हेतूवर प्रकाश टाकला. मुंबईत कामगार असलेल्या माणसांची सातारा वगैरे भागांत लहान लहान शेते असतात व त्यांना शेताचा आधार असल्यामुळे त्यांचा मुंबईमधील संप दीर्घकाळ चालू शकतो. मुंबईमध्ये असलेल्या कामगारांचा गावाकडील शेतीचा आधार काढून घेऊन त्यांना नि:शक्त करण्याचा सरकारचा हेतू असल्याचे त्यांनी उघड करुन सांगितले. मोठ्या प्रमाणावर शेती असणे हे तत्त्वत: शिंदे यांना मान्य असले तरी लहान शेतीचे इतर काही लाभ असतात ही दुसरी बाजूही त्यांनी उघड केली. शेतीच्या तुकड्याचा मोबदला पैशात देण्याऐवजी मोठ्या शेतक-यांकडून जमिन घेऊन त्या लहान शेतक-यांना देण्याची व्यवस्था त्यांनी सुचविली. असे करण्यात जास्त अडचण असली तरी न्यायही जास्त असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अर्थातच ही व्यवस्था मोठ्या शेतक-यांना असंतुष्ट करणारी असल्यामुळे सरकारला परवडण्याजोगी नव्हती. तुकडेबंदीच्या बिलाला जोडूनच मांडलेले दुसरे सारावाढीचे बिल हे शेतक-यांवर अन्याय करणारे कसे आहे हे त्यांनी आपल्या भाषणात विशद केले. ही दोन्ही बिले सरकारच्या हिताच्या दृष्टीने जुळी बिले असून हल्लीचाच सारा देण्याचे त्राण शेतक-यांत उरलेले नसताना त्यात आणखी जबर भर करावयाची म्हणजे सरकारच्या निष्ठुरपणाची कमालच आहे. "बॅक्बे डेव्हलमेंट, सक्कर बॅरेज असली अत्यंत खर्चाची कामे काढण्यामुळे आणि अत्यंत अंदाधुंदीने चालविल्यामुळे मुंबई सरकारचे जवळ जवळ दिवाळे निघाले आहे. अशा वेळी कोणीकडून तरी पैसा उकळण्याची सरकारला घाई झाली असणार. म्हणून त्यांनी गरीब व मुक्या प्रजेवर जुलूम करण्याचे धाडस चालविले आहे. उपाशी मरणा-या पीटरला लुबाडून उधळ्या पॉलला देण्याप्रमाणेच हे सरकारचे कृत्य निंद्य आहे. म्हणून हे बिल तर विचारातसुद्धा घेण्याच्या लायकीचे नाही." असे जोरदार प्रतिपादन शिंदे यांनी आपल्या भाषणात केले व भाषणाच्या अखेरीस बार्डोली येथे चाललेला लढा हा प्रजेच्या जागृतीचे आणि सरकारच्या नाचक्कीचे द्योतक असल्याचे सांगून ह्या लढ्याला नैतिक पाठिंबा दिला. बार्डोलीप्रमाणे महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही निवडक तालुके शोधून वेळ पडल्यास सत्याग्रहाची मेढ रोवावी लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. मात्र सत्याग्रह करणे ही अत्यंत जबाबदारीची कृती असून अगदी गरज भासल्यास ती महात्मा गांधीच्या सल्ल्याने आणि प्रत्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली करणे सुरक्षितपणाचे होईल असेही त्यांनी सांगितले, "सत्याग्रहाची म. गांधीची दृष्टी आणि भगवद्गीतेतील क्षत्रिय कर्मयोग यांत फरक आहे. हिंदू राष्ट्राने काळवेल ओळखून हल्ली तरी गीतेपेक्षा गांधीचेंच अनुयायी बनणे हितावह होईल, म्हणजे सत्याग्रह हा पूर्ण अनत्याचारीच ठेवावा लागेल. गीता हे पुरातन ध्येय आणि महात्मा हा आजकालचा चालताबोलता साधुश्रेष्ठ एक ऋषी. त्याच्याच झेंड्याखाली सर्वांनी आपसातील बेद विसरुन जमावे," टाळ्यांच्या गजरामध्ये अण्णासाहेब शिंदे यांचे भाषण संपले. त्यांच्या भाषणात अधूनमधून लोक टाळ्या वाजवून आपली सहमती व उत्साह प्रकट करीत होते. भाषणाच्या प्रारंबीच परिषदेत ठऱाव मंजूर करण्याचे काम करुन अत्यंत शांतपणे व शिस्तबद्ध रीतीने कौन्सिल हॉलवर मोर्चा नेण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे ही जबाबदारीची जाणीव अण्णासाहेब शिंदे यांनी श्रोतृसमुदायाला करुन दिली होती.

Read more: शेतकरी चळवळ
  1. शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष
  2. व्हायकोम सत्याग्रह
  3. विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग
  4. विचारविश्व
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
Page 112 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी