1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

परिशिष्टे १, २ आणि ३

लोकमान्य टिळकांचे शिंदे यांना पत्र (PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

परिशिष्ट  १/२

 

जाहीरनामा
श्री
बहुजनपक्ष

येत्या नवंबर महिन्यामध्यें हिंदुस्थानांत नवीन राज्यपद्धतीची प्राणप्रतिष्ठा व्हावयाची आहे. हा मुहुर्तकाल खास महत्त्वाचा आहे. ह्या काळानंतर हल्लींची पक्षघटना, हल्लींच्या राज्यपद्धतीबरोबर लयास जाऊन नवीन परिस्थितीला अनुसरून नवीन राजकीय पक्ष रचिले जाणार, हें भाकित कित्येक राज्यधुरंधर पुरूषांनी केलें आहे, तें खरें होणार. हल्लींचे “जहाल” अथवा “मवाळ”  किंवा “राष्टीय” व “प्रागतिक” हे नांवाचे मुख्य भेद केवळ पद्धतिदृष्टया पडले आहेत. तत्त्वदृष्ट्या नव्हेत. निरनिराळ्या दृष्टीनें पहातां दोन्ही पक्ष राष्ट्रीय किंवा प्रागतिक आहेत असें दिसून येईल. इतकेंच नव्हें, तर हल्ली “राष्ट्रीय’’ हाणविणारा पक्ष सामाजिक बाबतींत जितका व जसा मवाळ आहे, तितका व तसाच “प्रागतिक” हाणविणारा पक्ष सामाजिक बाबतींत जहाल आहे. तात्पर्य इतकेंच कीं, हे पक्ष केवळ कार्यपद्धतीच्या पायावर उभे झाले आहेत. तत्त्वभेदांवर उभे नाहींत. त्यामुळे पुष्कळ वेळां एकाच भूमिकेवर येऊन आपल्या सामान्य तत्त्वांना न सोडतां एक होऊन ह्या दोहों पक्षांना काम करतां येतें. उलटपक्षीं जेव्हां हे पक्ष परस्पर विरूद्ध झगडत असतात तेव्हां तेव्हां ते आपल्या कार्यपद्धतींना अघिक महत्त्व देत असतात किंवा ह्याहूनही कमी दर्जाचीं अशीं कांहीं व्यत्त्किविषयक कारणें घडल्यामुळें त्यांना तात्पुर्ते नसतें महत्त्व येऊन ते भांडत राहतात. अशा दुस-या प्रसंगीं त्या दोघांनाही प्रिय असलेलें जें सामान्य राष्ट्रहित त्यालाही बाधा येते, हें दोघांनाही कळत असतें. असो.


आमच्या भावी राजकारणांत ज्या नवीन नवीन पक्षांच्या पुनर्घटना होत जाण्याचा आज उद्यां संभव आहे, त्यांपैकीं ज्या एका नवीन पक्षाचा आह्यीं वरील मथळ्यांत उल्लेख केला आहे तो पक्ष उभारण्याची शक्यताच नव्हे तर इष्टता, किंबहुना आवश्यकता आहे, असें आमचे नम्र मत झालें आहे. हें मत आमच्या पुष्कळ दिवसांच्या अनुभवानें व निदिध्यासानें झालें आहे. ह्मणून आह्यीं तें जनतेपुढें प्रांजलपणानें आणि निश्चयानें ठेवीत आहों. ह्यावर आमच्या पुष्कळ मित्रांचाही मतभेद होण्याचा पूर्ण संभव आहे. इतरांची तर गोष्टच वेगळी. आमच्याशीं प्रामाणिक मतभेद असलेल्या मित्रांनी जर ह्या मतावर टीका केली तर तिच्यापासून आह्यांला जी शिकवण मिळेल व फायदा होईल, तो आह्यीं अवश्य करून घेऊंच घेऊं. परंतु ह्या आमच्या मतावर वादविवाद करण्याची मात्र आमची इच्छा नाहीं. ज्या अर्थी हें मत आह्यीं जनतेपुढें केवळ पूर्वपक्ष ह्मणून ठेवीत नाहीं, त्या अर्थी त्याला उत्तरपक्ष ह्मणून कसल्याही वादाचा अथवा मताचा स्वीकार करण्याची आह्यांला जरूरी दिसत नाहीं.


व्याप्ति : हिंदुस्थांनातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीय दृष्टया दोन मुख्य व स्पष्ट भाग पडत आहे ते हे कीं, एक, विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलानें पुढारलेला वर्ग आणि दुसरा ह्यांतील कोणतेंच बल अंगी नसल्यामुळें व नाइलाजामुळें मागासलेला वर्ग, किंवा बहुजनसमाज. ह्या दुस-या वर्गांतच अगदीं तिरस्कृत अशा “ अस्पृश्य” वर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लींच्या राजकीय सुधारणेचा नुसता अरूणोदय होतो व होतो तोंच ह्या दोन भागांमध्यें मोठा विराध भासूं लागला. आणि ह्या विराधानुसारें बहुजनसमाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक आतां जवळ जवळ नवीन पक्षच होऊन चुकला आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. ह्यालाच केव्हां केव्हां ब्राह्मणेतर पक्ष असेंही नांव दिलें जातें; पण नाइलाज आणि बलहीनता हीं जीं मागासलेल्या वर्गांचीं मुख्य लक्षणें, तीं ह्या वर्गाच्या पक्षास “ब्राह्मणेतर पक्ष” असें केवळ जातिविशिष्ट नांव दिल्यानें अगदीं काटेकोर रीतीनें सार्थ होत नाहीं. ह्मणूनच ह्या नवीन पक्षास “बहुजनपक्ष” अथवा “जनपदपक्ष” अशीं अगदीं सार्थ आणि निर्विकल्प नांवे दिल्यानें ह्यावर कसलेही आक्षेप आणणारास जागा उरणार नाहीं. जाती. धर्म अथवा सामाजिक डामडौल इत्यादि जे केवळ भावनात्मक विषय असतात, त्यांचा राजकारणांतील व्यवहारांशीं किंवा पक्षांशीं प्रत्यक्ष रीतीनें संबंध पोहोंचत नाहीं. ह्मणून अशा विषयांच्या पायावर किंवा सबबीवर राजकीय पक्षाची उभारणी करणें इष्ट होणार नाहीं, किंबहुना शक्यही नाहीं, असा इतिहासाचा अनुभव आहे. ह्यासाठीं आमच्या ह्या “बहुजनपक्षा” शीं देखील ह्या किंवा असल्या इतर आगंतुक विषयांचा तत्त्वत: संबंध नाहीं, हें निराळें सांगावयास नकोच. कारण, आमचा हा पक्ष केवळ ऐहिक हितसंबंधाच्या भरीव पायावर रचिलेला आहे. जात, धर्म अथवा देश एतदविषयक द्वेषाच्या किंबहुना प्रेमाच्या पोकळ भावनात्मक पायावर नव्हे. व्यत्त्कि किंवा व्यत्त्किसमूह कोणत्याही जातीचा अथवा कोणत्याहि धर्माचा अथवा देशाचा असो किंवा नसो, ते सर्व ह्या नवीन पक्षांत सामील होऊं शकतात. मात्र त्यांचा हितसंबंध आणि आमचा हितसंबंध एक असले पाहिजेत. इतकेंच नव्हे तर अशी त्यांनीं उघड उघड कबुली देऊन एकनिष्ठेची प्रतिज्ञा केली पाहिजे.


कार्यपद्धति : मुसलमान, ख्रिस्ती, शीख, यूरोपियन इत्यादिकांना स्वतंत्र मतदारसंघाचे सवलतीचे हक्क मिळाले आहेत. परंतु त्या हक्कांच्या बळावर हे वर्गही डोईजड होण्याचा संभव मात्र निःसंशय आहे. खरोखरच ते डोईजड होतील तर त्यांच्या आणि बहुजनसमाजाच्या हितसंबंधांत परस्पर विरोध उत्पन्न होणार. ज्या अर्थी अशा विरोधामुळेंच हिंदु समाजांतील पुढारलेल्या वर्गांशीं वेगळें होऊन, स्वतंत्रपणानें हा नवीन पक्ष उभा करावा लागत आहे, त्या अर्थी, वरील परदेशी किंवा परधर्मी लोक जर डोईजड होऊन आमच्या हितसंबंधांच्या आड येतील तर त्यांच्याशींही अगदीं स्वतंत्र बहाण्यानें ह्या पक्षाला वागावें लागेल, हें उघड आहे. तथापि ही महत्त्वाची गोष्ट देखील सर्वांनीं ध्यानांत ठेवणें जरूर आहे कीं, हा नवीन पक्ष जरी इतरांशीं स्वतंत्रपणानें वागणार आहे तरी जेथें जेथें त्याच्या हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील, तेथें तेथें त्याचा समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यत्त्कि असो अथवा पक्ष असो, त्याला सक्रीय साह्म करावयास तयार असेल, त्याच्याशीं तेवढ्यापुरतें सहकार्य करावयाला हा पक्षही तयार राहील. कारण ह्या पक्षाच्या पायाखाली केवळ पोकळ मनोभावना नसून, भरीव हितसंबंध आहेत. त्यांची राखण आणि पुरस्कार करण्याचें निस्पृह काम ह्या पक्षाला आपल्याच पायांवर उभा राहून व आपल्याच हातांनीं करावयाचें आहे. आमचे सहकारी ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असोत, मवाळ कीं जहाल असोत, किंबहुना स्वकीय असोत कीं परकीय असोत, त्यांनी कोणतींही नांवें, रूपें किंवा मतें स्वीकारिलीं असोत, फार तर काय त्यांचा पूर्वेतिहास कसाही असो, जोंपर्यंत आपल्या हितसंबंधांचा पुरस्कार प्रामाणिकपणानें आणि जोरानें त्यांच्या हातून होईल अशी आमची खातरजमा कायम राहील, तोंपर्यंतच आह्यी त्यांच्याशीं व तेवढ्यापुरतेंच सहकार्य करावयास मोकळे राहूं. एरवीं त्यांना आमचा रामराम. थोडक्यांत सांगावयाचें झाल्यास आह्यी आमच्या दोस्तांशीं समान दर्जानें केव्हांही करण्यास तयार, पण त्यांच्यांत सामील होण्यास तयार नाही; आणि जर कोणी आमचे दुष्मन असतीलच तर त्यांनाही पण आमचा दुरूनच रामराम! पण त्यांचाही द्वेष करण्यास आह्यीं तयार नाहीं. कारण द्वेषावर आमचा मुळी भरंवसाच नाहीं. आमचे कोणी हितशत्रु आह्यांला हे द्वेषाचें शुभवर्तमान शिकविण्यास आलेच तर त्याप्रसंगीं परमेश्वरच आमचें रक्षण करील.


हितसंबंध : आमची व्याप्ति व पद्धति वर सांगितली. पण आमची मुख्य मदार आमच्या विशिष्ट हितसंबंधांवरच आहे. हे हितसंबंध केवळ मनोभावनांवर किंवा एकाद्या तात्त्विक सामान्य सिध्दांतावर अवलंबून नाहींत. ते नित्याच्या व्यवहारांशी व ऐहिक नफ्यातोट्यांशी निगडीत आहेत. असे हे विशिष्ट हितसंबंध अर्थांतच असंख्य असल्यामुळें, त्यांची पूर्ण यादी तयार करणें हें कांहीं सोपें काम नाहीं व त्याची आज व्यावहारिक जरूरीही पण नाहीं. सामान्य स्वरूपानें त्यांतील कांहींचा येथे निर्देश करणें जरूर आहे. तथापि ही गोष्ट सर्वांनींच ध्यानांत ठेवणें अवश्य आहे. कीं, धर्म अथवा तत्त्वज्ञान ह्यांतील विषय किंवा मुद्दे ज्या प्रकारे त्रिकालाबाधित व शाश्वत स्वरूपाचे असतात, तसा राजकारणाचा प्रकार मुळींच नाहीं. बुद्धीबळांतील मोह-यांप्रमाणें राजकाराणांतील मुद्यांचा रोखच नव्हें तर ठावठिकाणही बदलणें भागच पडतें. राजकारण हें व्यवहारशास्त्र आहे. त्याचेहि नियम आहेत. पण त्या नियमांचे कायमचे साचे बनवितां येत नाहींत. आपल्या अंतिम ध्येयाला बाधा न आणतां आपले स्थान बदलणें, आपलें धोरण बळकट राखूनही आपला दर्शनी रोंख बदलणें, इत्यादि डावपेच राजकारणांत जो खेळेल तोच टिकेल. आणि अशा डावपेंचांत जो निर्भ्रांत प्रामाणिकपणा राखील, वाटेंत कोणत्याहि मोहाला वश होणार नाहीं, संकटाला जुमानणार नाहीं, कीं कपटाला बळी पडणार नाहीं तोच ह्या खेळांत अखेरी मारील. ह्मणूनच राजकारणाचा जरी कोत्या दृष्टीच्या कांहीं लोकांनीं एकाद्या वेश्येप्रमाणें धिःकार केला आहे, तरी जे खरे दूरदर्शी आहेत त्यांनी ह्याची अत्युच्च कर्मयोगांत गणना केली आहे. ही दूरदृष्टि शाबूत ठेवूनच खालील हितसंबंधांचे निदर्शन करण्यांत आलें आहे.

 

१ शेतकरी वर्ग - ह्यांत डोईजड जमीनदारांचा अथवा पिढीजाद जहागीरदारांचा समावेश मुळींच होऊं शकत नाहीं. जो आपल्या मालकीचें अथवा कौलाचें शेत आपणच वाहतो, आणि त्या कामासाठीं पुरेशा मजूरदारांना समान दर्जानें योग्य वेतन देऊन सांभाळतो. तोच शेतकरी जाणावा पाश्चात्य देशांत अशालाच “पेझंट प्रोप्रायटर” हाणतात. तो जरी स्वतंत्र असला तरी, त्याला कोठेंही धन, विद्या अथवा अधिकार नसल्यामुळें, अद्यापि तो सर्वत्र मागसलेला राहिला आहे.


२ शिपाईवर्ग - ह्यांत सरदारांची गणना मुळींच नाहीं. कारण अधिकारबलामुळें त्यांचा समावेश पुढारलेल्या वर्गांत करणें योग्य आहे. हितसंबंधांच्या विरोधामुळें बहुजनपक्षांत हे सामील न होणे साहजिकच आहे. पण सामान्य शिपायांचे हितसंबंध आमच्या पक्षानेंच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेलेच आहेत. कुणबी हा सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमिनदार अथवा जहागिरदार हें केवळ त्याचे पोष्य होत! तसेंच हातावर शीर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय होय. तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे. त्याच्या बळावर किताब मिळविणारे व पिढीजाद पेन्शनें झोडणारे सरदार हे जातीनें क्षत्रिय असले तरी ते मागसलेले नसतात ह्मणूनच त्यांच्या हितसंबंधांची काळजी आमच्या पक्षाला वाहाण्याचें कारण नाहीं. पण शिपाईगिरी मात्र आह्यीं राखलीच पाहिजे. ती आह्यी आनंदानें राखूं.


३ शिक्षक वर्ग -  ह्यांत सोंवळेंशास्त्री, हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी हे असल्या इतर ऐतखाऊंची गणना करतां येत नाहीं. वाड्मयाचें किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत, आणि जे आपल्या वृत्तीचा पिढीजाद हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणें चालू वेतन घेण्यास तयार आहेत, त्यांची जात, धर्म, देश कांहीं असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षानें राखणें जरूर आहे. कारण तेही मागासलेलेच आहेत व त्यांचे हितसंबंध हे राष्ट्रीय आहेत.


४ उद्यमी - सुतार, सोनार, साळी, शिंपी, गवळी, माळी, तेली, तांबोळी, इत्यादी दिसण्यांत लहानसान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित आणि अनधिकारी वर्ग आहेत, हेही राष्ट्राचे धारक असून ह्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई  यांच्यापेक्षां रतीभरही कमी नाहीं ते मागसलेले आहेत. नाटकवाले, गोंधळी, शकून सांगणारे जोशी आणि पोवाडे गाणारे शाहीर, फार तर काय पण वैदू आणि पोरक्या मुलांना पाजणा-या दायांचीही जरूरीं प्रसंग विशेषीं ह्या बहुजन-समाजरूपी बळीराजाला लागते. तर मग त्यांच्या हिताचा विसर त्याला कसा पडेल?


५ दुकानदार - ह्यांत व्याज देऊन दुस-यांचे भांडवल वळवून आणून त्यावर गब्बर होणारे पेढीवाले वर्ज्य आहेत, असें समजावें. परंतु उद्यमी लोकांच्या व मजुरांच्या साह्याने जी राष्ट्रीय संपत्ति शेतक-यांनें निर्माण केली व शिपायानें राखिली तिची देशभर वांटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांचीही तितकीच जरूरी आहे. तोही जोंवर मागसलेला राहील, आणि डोइजड होऊन बहुजनसमाजाचें रक्त बिन हक्क शोषणार नाही तोंवर त्यालाही पुढें आणण्यासाठीं आमच्या पक्षानें झटणें अवश्य आहे.


६ मजूरवर्ग - ह्यांत बाजारभावाप्रमाणें वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हें तर बुद्धिचातुर्य लढविणारे वकील, डॉक्टर ह्यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबलामुळें आपल्या गरजेपेक्षां ज्यास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही जाऊन सहज बसतो. इतकेंच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजनसमाजाचेंही पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वांट्याला येंते. आणि मग सगळीच कालवाकालव होऊं लागते. असे लोक तत्त्वतः मजूर असले तरी वस्तुतः मागसलेले नसल्यामुळें, त्यांच्या हितसंबंधाची जोपासना करण्याची जबाबदारी दुर्बळ जन-पद-पक्षावर न ठेवतां, त्यांच्या स्वतःवरच ठेवणें अधिक योग्य होईल. बाकी उरलेल्या ख-या आणि अंगमेहनती मजुरांची दाद तर आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेंच लागणें शक्य नाहीं. बाजारभावाप्रमाणे आपल्या मजुरीचे दर, कामाची वेळ, विश्रांतीच्या अटी, बाळपण, आजारीपण, ह्यातारपण, कौटुंबिक आणि स्त्रीपणाच्या आपत्ति इत्यादि कारणांवरून उद्भवणारे हक्क वगैरेंची मागणी करण्यास हा वर्ग मोकळा आहे, ह्याविषयीं तर प्रश्नच नाहीं. पण ही मागणी राष्ट्राचें समवाय-हित सांभाळून, ती पूर्ण रीतीनें वसूल करून घेण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगी येईल अशी संघशक्ति त्यांच्यामध्यें आणणें हें ह्या पक्षाचें अत्यंत महत्त्वाचें, जरूरीचें आणि कठिण असें कर्तव्य आहे. तथापि हा पक्ष ह्मणजे केवळ मजूरपक्षच नव्हे. तो जनपदपक्ष असल्यामुळें सर्व राष्ट्राचा पक्ष आहे. मजूर डोईजड झाल्यास त्याची समजूत करण्याचाही अधिकार सर्वांपेक्षां ह्या पक्षालाच जास्त आहे.


७ अस्पृश्यवर्ग - अस्पृश्यपणामुळें हा वर्ग मागसलेला आहे, इतकेंच नव्हें तर चिरडला आहे. धर्माची, परंपरेचीं, रूढींचीं, अगर दुसरीं कोणतींही खरीं खोटीं कारणें सांगत न बसतां ह्या वर्गाची अस्पृश्यता व असाह्मता पूर्णपणें नष्ट करून त्यांना अगदीं समानदर्जानें बहुजनसमाजांत एकजीव करणें हें ह्या पक्षाचें केवळ पवित्र काम आहे. तें तातडीनें केलें तर धडगत आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादांत, ढोंगी ठरावांत आणि मतलबी सहानुभूतींत अगोदरच दवडली गेली असल्यामुळें, ह्या  वर्गांतील कांहीं व्यक्तींना साहाजिकपणें भलतेंच  वळणही लागून चुकलें आहे. ही ठेंच खाऊनही आमच्या पक्षाचे डोळे उघडले नाहींत तर ते कायमचे झांकलेले बरे, असें ह्मणण्याची पाळी जवळ येऊन ठेपली आहे!


८ स्त्रीवर्ग - चालूं राज्यक्रांतींत आमच्या देशांतील स्त्रीवर्गाचे हातीं कांहींच लाभलें नाही ह्मणून आमच्या पक्षानें हताश होण्याचें कारण नाहीं. उलटपक्षीं, आमचा पक्ष विद्वानांचा नाहीं, वतयांचा नाहीं, ह्मणून तो स्त्रीवर्गाला विसरणारांचा आहे असें थोडेंच होणार आहे! स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा! त्यांची हयगय करूं तर पाळण्यांतच आमचे थडगें डोलूं लागेल हे आह्यीं पूर्ण जाणून आहों. ह्याची साक्षही आह्यी थोडी बहुत पटवून दिली असतांही नामधारी “राष्ट्रीय’’ आमच्यावर रागावतात आणि “प्रागतिक”’ ही आयत्या वेळेस आमच्यावर रुसतात. पण आज नाहीं उद्यां तरी जागरूक स्त्रियांच्या ध्यानांत खरा प्रकार आल्याशिवाय राहणार नाहीं.


येथवर आह्यीं केवळ वर्गवारीनें हितसंबंधांचें निरीक्षण केलें. पण ज्यांची अशी वर्गवारी मुळींच करतां येत नाहीं असे पुष्कळ हितसंबंध आहेत. त्यांचा पुरस्कार करण्याची जरूरी पुढारलेल्या पेक्षांही मागसलेल्यांसच जास्त आहे, हें बारकाईनें विचार केल्याशिवाय स्पष्ट दिसणार नाहीं. उदाहरणार्थ सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधि आणि सामाजिक परंपरा पाळण्याचे बाबतींत स्वयंनिर्णयाचा, इत्यादि कोणताही प्रश्न घ्या.


हे सर्व राष्ट्रीय असूनही, स्वत:स “राष्ट्रीय” म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हां त्यांच्या आड येतो आणि “प्रागतिक” म्हणवून घेणारा पक्षही आपले हात टेंकतो तेव्हां बहुजनसमाजास जागें करून त्याला स्वत:च्याच पायावर उभें करण्याचें कठीण काम करण्यासाठीं आमच्यासारख्या एकाद्या नवीन आणि स्वतंत्र पक्षाला पुढें यावें लागतें, ह्यांत आमचा नाइलाज आहे. निदान आमची प्रौढी तरी खास नाहीं. इतकेच नव्हें तर ह्या पूर्वीच हा पक्ष निर्माण झाला नाहीं आणि पुढें तरी ह्याचे हातून काय होणार, याची खातरजमा नाहीं, तोंपर्यंत ह्या विषयावर अधिक विचक्षणा करण्याचें देखील आम्हांला धैर्य येत नाहीं. राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल, ज्याचे हितांचा आमच्याशीं विरोध नसेल, ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साह्म तरी करतीलच. इतर वावदूकांच्या वाटेला जाण्याला आम्हांला वेळ नाहीं. त्यांच्या उपटसूळ वादांवर आमचा विश्वासच नाहीं, ह्यांत आमचा तरी काय इलाज?


वरील विवेचन आम्हीं केवळ आमच्या अनुभवानें केलें आहे. तें निर्भ्रांत आहे, असा आमचा भ्रम झालेला नाहीं, एवढी तरी आमच्यामध्यें जागृति आहे. वरील विवेचनांत चूक असेलच तर ती जोंपर्यंत आम्हांला दिसत नाहीं, तोंपर्यंत आम्हीं उगाच खोळंबून राहावें हें आम्हांस आत्मघातकी व देशघातकीपणाचें वाटत आहे. पक्षाची रचना किंवा घटना व्हावयाची आहे. हा लेख त्याची जाहीर प्रस्तावना एवढ्याच भावनेनें प्रसिद्ध करण्यांत येत आहे. पुढील कार्य ईश्वरी संकेतावरच अवलंबून आहे.

 

विठ्ठल रामजी शिंदे.
नानाची पेठ, भोकरवाडी,
पुणे, ता. १ सप्टेंबर १९२०

Read more: परिशिष्टे १, २ आणि ३

परतीचा प्रवास

हॉलंडमधील खेडी वैशिष्ट्यपूर्ण आणि नमुनेदार असतात असे ऐकिवात आल्याने परिषदेसाठी आलेल्या पाहुणेमंडळींनी एखादे खेडे पाहावे असे योजिले होते व त्याप्रमाणे व्यवस्थापक मंडळींनी सोय केली होती. ऍमस्टरडॅमपासून जवळच असलेले व्होलंदाम नावाचे एक जुने खेडे बघण्यासाठी निरनिराळ्या राष्ट्राची सुमारे दोनशे मंडळी तेथे ४ सप्टेंबरच्या दुपारी पोहोचली. समुद्रसपाटीपेक्षा या खेड्याची सपाटी चार फूट खाली असावी. एवढी पाहुणेमंडळी आलेली दिसताच कुतूहलाने त्यांना बघण्यासाठी खेड्यांतील माणसे दारासमोर उभी होती. डच लोकांची स्वच्छतेसंबंधी मोठी ख्याती आहे. त्यांच्या घरातील साधेपणा, स्वच्छ व टापटीप पाहून आपल्याला मोठा आनंद झाला असे शिंदे यांनी नमूद केले आहे. ह्या आनंददायक कार्यक्रमाने जणू परिषदेचा शेवट झाला.

ऍमस्टरडॅम शहराचा निरोप घेऊन दुस-या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर १९०३ रोजी सकाळी शिंदे जर्मनी येथील कलोन या शहरी पोहोचले. तेथील हॉटेल एविग् लँपमध्ये उतरले. कलोन येथील कॅथीड्रल हे जगातील एक आश्चर्य मानले जाते. सकाळची न्याहारी करून लगोलग ते कॅथीड्रल पाहण्यास गेले. एवढी सुंदर इतिहासप्रसिद्ध इमारत असूनही बाजारातील गर्दीच्या भागात ती कोंडल्यासारखी झाली आहे असे शिंदे यांना वाटले. कॅथीड्रलच्या भव्यतेने ते स्तिमित झाले आणि चौकातून तिच्याकडे पाहत राहिले. आपल्या मनःस्थितीचे वर्णन त्यांनी विनोदात्म पद्धतीने केले आहे. “हातात कॅमेरा होता, पण चित्रासारखा कितीतरी वेळ आ वासून पाहात राहिलो असता मलाच कितीतरी लोक पाहून गेले असावेत.” आश्चर्याचा आवेग ओसरल्यावर इमारतीत शिरून त्यांनी निरीक्षण केले. बांधकाम गॉथिक थाटाचे होते. काळ्या कुरुंदाचा दगड वापरला होता. उंच निमुळत्या कमानी एकावर एक लावलेल्या होत्या. हे कॅथीड्रल म्हणजे त्यांना गॉथिक शोभेची परमावधी वाटली.

शिंदे ७ तारखेस सोमवारी स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या हद्दीवरील बाझल (बाल) या शहरी रात्री आठच्या सुमारास पोहोचले. तेथे थोडावेळ थांबून ते निघाले व रात्री ११च्या सुमारास आल्प्स पर्वतातील ल्यूसर्न ह्या अत्यंत रमणीय गावी पोहोचले. हे गाव ल्यूसर्न नावाच्याच सरोवराच्य काठी आहे. ह्या रम्य ठिकाणी त्यांनी चार दिवस विश्रांतीत आणि एकांतवासात घालविले. येथील गरीब मजून कोणत्या स्थितीत राहतात ह्या कुतूहलापोटी एका स्विस् गरीब मजुराचे घर पाहून माहिती घेतली. चार दिवसानंतर ११ सप्टेंबर रोजी ल्यूसर्न सोडून ते इटली येथील जिनोव्हा या शहरी गेले. दुस-या दिवशी तेथील कॅम्पो सँटो नावाची अत्यंत सुंदर स्मशानभूमी पाहिली.

मुंबई विश्वविद्यालयात असताना रोमचा प्राचीन इतिहास हा शिंदे यांच्या आवडीचा विषय होता. परतीच्या प्रवासात रोम काळजीपूर्वक पाहावयाचे असे त्यांनी ठरविले होते. म्हणून ल्यूसर्नहून निघून ते रोमला पोहोचले. रोममधील प्रसिद्ध स्थळे, पुतळे व चित्रे आस्थापूर्वक पाहण्यात त्यांनी पाच दिवस घालविले. हे पाच दिवस त्यांना मोठे बोधाचे वाटले. तिस-या दिवशी पोप पायसचे त्यांनी इतरांसमवेत दर्शन घेतले.

ज्यांची वर्णनेच केवळ ऐकली होती अशी जगप्रसिद्ध शिल्पे व वास्तू त्यांना पाहावयास मिळाल्या. मायकेल अँजेलो ह्या अद्वितीय प्रतिभावंत शिल्पकाराने चाळीस वर्षे मेहनत घेऊन आपल्या प्रतिभेने कोरलेला सेंट मोझेसचा पुतळा सिस्टाईन चॅपेल येथे पाहिला. इटालियन लोकांची शिल्पकला आणि चित्रकला यांतील वैभवाला या शहरात नुसता पूर आला आहे असे त्यांना वाटले. दोन हजार वर्षांपूर्वीच्या अँफी थिएटरसारख्या प्राचीन इमारतींचे अवशेष त्यांनी मोठ्या आतुरतेने पाहिले. प्रेक्षणीय स्थळांची चित्रे विकत घेतली. पाच दिवस रोममध्ये त्यांनी मोठ्या आनंदात घालविले.

१८ सप्टेंबरला ते नेपल्स या अत्यंत सुंदर अशा शहरी आले. समुद्रकाठावरील टेकडीवरून उंच उंच जाणारा रस्ता पाहून त्यांना मुंबईच्या मलबार हिलची आठवण झाली. आतापर्यंत केवळ भूगोलाच्या पुस्तकात ज्याचे वर्णन वाचलेले असते त्या व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा धुमसणारा भीषण देखावा त्यांनी आपल्या हॉटेलच्या खिडकीतून पाहिला.

दोन हजार वर्षांपूर्वी भूकंपामुळे व ज्वालामुखी पर्वताच्या तप्त रसामुळे गाडल्या गेलेल्या पाँपी शहराचे उत्खनन १८८५च्या सुमाराला झाले व त्याला आता प्रेक्षणीय स्थळाचे रूप प्राप्त झाले होते. नेपल्सपासून चार-पाच मैलांवर असलेले हे शहर पाहण्यासाठी शिंदे १९ तारखेस तेथे गेले. फर्ग्युसन कॉलेजमधले रोमच्या इतिहासाचे सर्व अध्ययन या ठिकाणी आठवून त्यांच्या अंगावर आनंदाचे शहारे आले. शिंदे हे एखाद्या गोष्टीचे अवलोकन करीत असताना इतिहास, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, नीती यांच्या अंगाने करीत असत आणि या सर्वाहून अधिक म्हणजे त्यांची दृष्टी ही विविध प्रकारच्या सौंदर्याचा आस्वाद घेणा-या रसिकाचीही असे. त्यांच्या निरीक्षणाचे अनेकविध पैलून पाँपीमध्ये त्यांनी केलेल्या निरीक्षणातून प्रकट होताना दिसतात. “उत्खनन केलेल्या या पाँपी शहरातील रस्ते बळकट फरसबंदीचे होते. त्यावर खटा-याची चाकोरी दिसली... एका चार चौरस फूट दगडावर उठावदार कोरलेले एक चित्र पाहिले. त्यात वर्तुळाकार आकाराभोवती एका सापाने विळखा दिला आहे असे हे कोरीव चित्र होते. ह्यावरून तेथे सर्पपूजा होती का? दारूची दुकाने व दारू ठेवण्याच्या रांजणावर शिंपा लावून नक्षी केली होती. लोक मेण्यात बसून जात होते असे देखावे दिसले. कोंबड्यांची झुंज, नरमेध वगैरे चित्रांवरून दिसतात. एका घराच्या दिवाणखान्याचा तांबडा राखेचा रंग अगदी ताजा दिसला. शेवटी रोमन लोकांची नीती फार बिघडली असे इतिहास सांगतो. मी तर ह्या घराच्या भिंतीवर अंतर्गृहात फार बीभत्स चित्रे स्पष्ट पाहिली... सृष्टीविरुद्ध मैथुनकर्म केल्याची स्पष्ट चित्रे आहेत. येथील संग्रहालयात उकरून काढलेल्या १५ मानवी सांगाड्यांच्या प्रतिकृती हुबेहुब प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ठेवल्या आहेत.” व्हेसुव्हियसच्या राखेत हे शहर जेव्हा दडपले गेले तेव्हा जी माणसे, ज्या स्थिती दडपली गेली त्याचा स्पष्ट देखावा कसा दिसतो हे त्यांनी तपशीलवार बघितले. रांजण, हौद, वगैरे दगडामातीच्या घरगुती वस्तू पाहून तसेच विस्तीर्ण बाजाराचा चौक, अर्धवर्तुळाकार मंडई, सार्वजनिक व्याख्यानाच्या जागा, भव्य जोती वगैरे पाहून तत्कालीन कौटुंबिक व सामाजिक स्थिती अजमावण्याची ही साधने होत या भूमिकेतून त्यांनी निरीक्षण केले.१

ह्या दोन वर्षांच्या अवधीमध्ये शिंदे यांनी केलेल्या प्रवासाचा नेपल्स व पाँपी हा शेवटचा टप्पा. नेपल्सहूनच ते हिंदुस्थानच्या परतीच्या प्रवासाला निघणार होते. ते इंग्लंडमध्ये केवळ धर्माचे पुस्तकी शिक्षण घेण्यासाठी गेले नव्हते. “मुख्यतः तुलनात्मक पद्धतीने जगातील सर्व धर्माच्या इतिहासाचे, त्यांच्या विकासाचे अध्ययन करून स्वतःची धर्मबुद्धी विशद करून धर्मप्रचाराची तयारी करणे हा तर मुख्य उद्देश होताच. त्याशिवाय युरोपातील काही प्रमुख देशांतील चालीरीती पाहाव्या, वाङ्मय वाचावे, पंडित आणि सज्जनांच्या भेटी घ्याव्यात, नव्या-जुन्या संस्थांची वाढ पाहावी, निरनिराळ्य वर्गांची-विशेषतः खालच्या व चिरडलेल्या वर्गाची-अंतस्थ स्थिती निरखावी, त्यांच्यात राहावे, सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळे पाहावीत इत्यादी दुसरेही हेतू होते.”२ त्यांच्या मनातील हेतू ब-याच प्रमाणात सफल झाले होते.

शिंदे यांनी दोन वर्षांच्या प्रवासात इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इटली हे सात देश थोडेबहुत पाहिले. शिंदे स्वतः या दोन वर्षांच्या अवधीत इंग्लंडात आणि अन्यत्र मोकळेपणाने, स्वाभाविकपणाने वावरले. त्यांच्या ठिकाणी न्यूनगंडाची जाणीव यत्किंचितही प्रकट होताना आढळत नाही की, आपल्या परंपरेच्या दुराभिमानाचा स्पर्श त्यांच्या वागण्याबोलण्याला होताना आढळून येत नाही. म्हणून ते इतर राष्ट्रांतील लोकांकडेही स्वाभाविक वस्तुनिष्ठपणे पाहून शकत होते. ह्या दोन वर्षांच्या इंग्लंडातील वास्तव्यानंतर आणि इतर देशातील केलेल्या प्रवासानंतर त्यांची काही मते बनली होती. एकंदरीत त्यांना इंग्लिश लोक बरे दिसले. फ्रेंच अधिक उल्हसित आणि इटालियन मात्र मनातून उतरावे असे. आल्प्स पर्वत व –हाईन नदी प्रशस्त व रमणीय दिसली. मात्र इंग्लंडमध्ये विशाल असा देखावाच नाही. सर्व लहान प्रमाणावर साधे व नयनमनोहर वाटले. इंग्रज लोक घुमे पण व्यावहारिकदृष्ट्या शहाणे वाटले. श्रीमंत व दारिद्र्य हे तेथे सारखेच मिसळले असले तरी ह्या चिमुकल्या बेटात संतोष व शांती आहे असे त्यांना जाणवले. दारूचे व्यसन आणि लैंग्य व्यभिचार शहरामध्ये बोकाळला आहे, पण खेडी व राने शुद्ध आहेत. शेती खालावत आहे. भावी नाशाची चिन्हे अद्याप स्पष्ट दिसत नसली तरी साम्राज्याच्या पापाचा परिणाम भोगल्याविना त्यांची सुटका नाही असेही त्यांना जाणवले. आधुनिक सुधारणेची आणि यंत्राच्या आक्रमणाची काळी बाजू हीही त्यांना विशेषत्वाने जाणवून गेली. मात्र हिंदुस्थानला शिकण्यासारखे युरोपत अद्यापि पुष्कळ आहे हेही त्यांना मनोमन जाणवत होते. स्वतः शिंदे मात्र खूप काही शिकून हिंदुस्थानच्या परतीच्या प्रवासाला सिद्ध झाले.

त्यांना हिंदुस्थानला परत घेऊन येणारी रुबातिनो ही इटालियन बोट नेपल्सहून २१ सप्टेंबर १९०३ रोजी निघाली.

बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजे २१ सप्टेंबरलाच मुंबईहून ते इंग्लंडला येण्यासाठी बोटीने निघाले होते. त्या वेळी नवीन जग बघण्याची, नवे अनुभव घेण्याची उत्सुकता त्यांच्या मनात होती. परत जाताना ती उत्सुकता व ते कुतूहल शमले होते. वृत्ती शांत, अधिक प्रगल्भ झाल्या होत्या. बोटीच्या प्रवासाचे आता काही नावीन्य राहिले नव्हते. बाहेरचे बघण्याऐवजी त्यांची दृष्टी जास्त आत वळलेली होती. मनाच्या अशा अवस्थेत असताना त्यांना आलेला एक उच्च आध्यात्मिक अनुभव त्यांनी नमूद करून ठेवला आहे. या प्रकारचा अनुभव त्यांना इंग्लंडमध्ये बॉरोडेल दरीत रात्रीच्या चंद्रप्रकाशात शतपावली करीत असता, तसेच स्कॉटलंडमध्ये बेन लोमंडच्या शिखरावर आलेला होता. या प्रकारच्या अनुभवाला शिंदे हे गूढतेचे वलय देत नाहीत. अशा प्रकारचा आध्यात्मिक अनुभव ही आत्म्याची नैसर्गिक अवस्था आहे अशीच त्यांची धारणा दिसून येते. देव दिसतो काय? ह्या चार ओळींच्या एका टिपणामध्ये त्यांनी तो पाहण्याची साधने नमूद केली आहेत. तो कारणरूपाने, सौंदर्य अथवा प्रेमरूपाने व नीतिरूपाने प्रकट होतो. दुस-या एका ठिकाणी सौंदर्य, सत्त्व यांतून साक्षात्कार घडतो व हा साक्षात्कार म्हणजे अनंताचे भान असे त्यांनी नमूद केले आहे.३

रुबातिनो ही बोट नेपल्सहून निघून पाच दिवस झाले होते. ह्या अवधीत शिंदे यांनी आपल्या जवळच्या डायरीत काहीही नमूद केलेले नाही. २६ सप्टेंबरला मात्र त्यांनी ‘तांबड्या समुद्रावरील संध्यावंदन’ या शीर्षकाखाली एक नोंद करून आपल्याला आलेला आध्यात्मिक अनुभव व अनुषंगाने केलेले चिंतन नमूद केले आहे. शिंदे यांनी लिहिले आहे.

“७ वाजता जेवण झाल्यावर डेकवरच्या एका कोप-यात बसलो. मंडळी आरामखुर्च्यांवरून पडली. भोवती मुले खेळत होती. खलाशी खुशालीत होते. अधिकारी स्वस्थ. धूम्रभक्त-धूम्रसेवन. समुद्र अगदी शांत. चतुर्थी चंद्रकोर क्षितिजावर लोंबत होती. महंमदाची ही निशाणी. ख्रिस्ताच्या राज्यातून महंमदाच्या राज्यात आम्ही आलो. चांदणे विरळ. समुद्र सौम्य. परवाच इतका कोपला होता की, आमची क्षुद्र बोट खालवर होत होती, आम्ही हालत होतो तरी बाजूस पाहिल्यावर माझ्याशिवाय सारे जग हालत आहे असा भास. लाटा, क्षितिज, चंद्र, आकाश यांची तत्त्वे हालत. स्वयंजन्य माणसाला असाच भ्रम नेहमी होतो. तोच मी जेव्हा बोटीकडे पाहिले तेव्हा कळले आम्हीच हालत आहोत. बाकी सर्व स्थिर आहेत.

“ह्याप्रमाणे दृष्टी आत वळल्यावर विचाराला गांभीर्य आले. लहान गोष्टीवरून थोर गोष्टीकडे वळले. भोवतालचा गलबला कमी ऐकू येऊन लागला. चंद्रकिरणातून क्षितिजात खोल नजर लागली. गार वारे. मंद गती. नावेचे नियमित गीत. समुद्राची साद. आकाशाची मिश्र छबी. अशा गूढ सौंदर्यात मन गार झाले. अवर्णनीय सुखाचा अनुभव आला. प्लेटोचे Bealife Viasu  अथवा कुराणात ‘दे सी द फेस ऑफ गॉड’ अथवा आमची दुसरी मुक्ती ‘समीपता’ ही घडली.

आयुष्याचा तो अतिदुःखी क्षण-जेव्हा आम्ही बळाने मरण ओढून घेतो; पण तो अतिसुखी क्षण की जेव्हा आम्ही मरण्यास अगदी खुशी असतो. दृष्टं दृष्टव्यः श्रुतं श्रोतव्यः असे झाले असता असे क्षण येतात. तोच क्षण हा होता. अशा वेळी मरण म्हणजे कालिदासाने म्हटल्याप्रमाणे प्रकृती होय. गूढ सौंदर्य उघड सौंदर्याहून अगदी जास्त सुंदर. Heard melodies are sweet but unheard are sweeter – Keats. तसा माझा प्रकार झाला. मजपुढे दृश्य चमत्कार थोडेच होते. आल्प्सचे शिखर, ल्यूसर्न सरोवर,
-हाईन नदीचा काठ, कॅथॉलिक धर्माची भव्य व सुंदर देवळे, इटालियन चित्रे इत्यादी अनेक सुंदर कृती पाहिल्या. पण हल्ली (या क्षणी) मजपुढे थोडा प्रकाश आणि पुष्कळ अंधार ह्यामध्ये आनंदधाम सुंदरतेची जी झाक दिसली तिने क्षणात सामीप्य मुक्ती मिळाली. कारण आताचे अनंत रूप वाच्य थोडे; व्यंग्य फार. कारण मी बहिर्मुख नव्हतो. मला दिसत होते ते वर काळ्या आकाशाचे घुमटाचे विरल तारे टिकटिकलवत. चंद्रकोर पाण्याला टेकलेली. तिच्या भोवतालचा थोडाच प्रदेश दिसतो. तिच्या अंधुक प्रकाशात थोड्या लाटा दिसत. एवढ्या दृश्यावरूनच आप, तेज, आकाशादी पाची तत्त्वे, त्या सर्वांमागचे सर्वाधार महातत्व, हे विराट तत्त्व आता दिसू लागले. इतके, की दोन प्रहरी सर्व उघडे होते तेव्हा हे दर्शन झाले नाही. म्हणून मी वंदनही केले नाही. आता ह्या सायंकाळी लहान गोष्टी जेव्हा अस्तास गेल्या, दूरचे गहन सूर्यही जे अंधुक तारांच्या क्षुद्र रूपाने दिसू लागले तेव्हा अणोरणियान् महतो महियान् महाभूत ते पुढे दिसले. दूर ते जवळ झाले. मी त्यास वंदन, पुन्हा वंदन, शतशः वंदन, असंख्य वंदन करू लागलो. सत्यं ज्ञानं अनंतम्”।४

इंग्लंडहून परत येत असताना एक प्रकारची सफलतेची जाणीव ते अनुभवीत होते. वृत्ती शांत, अधिक प्रगल्भ झाल्या होत्या. मन व्यासंगाने, चिंतनाने, अनुभवाने अधिक अध्यात्मप्रवण बनले होते. म्हणून यासारखा उच्च दर्जाचा आध्यात्मिक अनुभव ते सहजतेने घेऊ शकत होते.

इंग्लंडमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात सुबोधपत्रिकेला त्यांनी विविध प्रकारचे लेख पाठविले होते. त्यामधून त्यांनी प्रवासाची, आपल्या अनुभवाची, तेथील परोपकारी संस्थांच्या कार्यपद्धतीची वेधक चित्रे रेखाटणारी आणि चिंतनगर्भ विचारप्रवर्तक अशी पत्रे पाठविली होती. त्यामधून त्यांची धर्मनिष्ठा, धर्मप्रचाराची कळकळ, संघटनेची दृष्टी ही तर प्रकट होत होतीच; शिवाय त्याच्या जोडीने, श्रेष्ठ दर्जाचा वाङमयीन आनंद देण्याची क्षमता असलेली उत्तम मराठी गद्यशैली प्रकट होत होती. या कारणांनी विठ्ठल रामजी शिंदे यांची योग्यता आणि गुणवत्ता प्रार्थनासमाजातील बंधूंना अधिक प्रत्ययाला आली होती. शिंदे यांचे आगमन मुंबई प्रार्थनासमाजाल प्रेरणादायी ठरेल असा विश्वास समाजबांधवांना वाटू लागला होता. त्यांचे त्या वेळचे समाजबंधू श्री. वामनराव सदाशिव सोहोनी यांनी लिहिले आहे, “रा. विठ्ठलरावांचा व माझा परिचय ते विलायतेस धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यास जाण्यापूर्वीच्या त्यांच्या मुंबईच्या वास्तव्यात झाला. विलायतेहून परत आल्यावर ते प्रा. समाजाचे काम करणार अशी आमची खात्री असल्यामुळे आम्ही त्यांच्या विलायतेहून परत येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहात होतो. त्यांनी सुबोधपत्रिकेसाठी धाडलेली अनेक पत्रे त्यांच्याविषयीचा आदरभाव वृद्धिंगत करण्यास कारणीभूत झाली.”५ म्हणून सर्व समाजबंधू विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्वागत करायला उत्सुक होते.

शिंदे यांना घेऊन येणारी रुबातिनो ही इटालियन बोट ६ ऑक्टोबर १९०३ रोजी मुंबई बंदराला पोहोचली.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. १५३-१५४.
२.    तत्रैव, पृ. १५४.
३.    शिंदे यांची १९०१ ते १९०३ ह्या प्रवासातील छोटी रोजनिशी, शिंदे यांचे कागदपत्र.
४.    तत्रैव.
५.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २३४.

पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचे पुणे

विठ्ठलरावांचा वस्तुतः कल तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे असल्यामुळे बी. ए. मध्ये ऐच्छिक विषय तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र (लॉजिक आणि मॉरल फिलॉसॉफी) हे विषय घेणे स्वाभाविक ठरले असते. परंतु त्यांनी इतिहास आणि कायदा हे विषय ऐच्छिक म्हणून घेतले. आपल्या आवडीचे विषय त्यांना सोडून द्यावे लागले ह्याची सबळ कारणे होती. इंटरमीजिएटच्या परीक्षेत पहिल्या वेळी त्यांना नापास व्हावे लागले होते आणि तेही त्यांना आवडणा-या तर्कशास्त्र ह्या विषयात. त्यामुळे आपण आपल्या आवडीचे लॉजिक आणि मॉरल फिलॉसॉफी हे विषय घेऊन बी. ए. ची परीक्षा पास होऊ अशी त्यांना खात्री वाटत नव्हती. बी. ए. ला कायदा हा विषय घेऊन त्या पेपरमध्ये शेकडा साठपेक्षा जास्त मार्क मिळाल्यास फर्स्ट एल्. एल्. बी. ची परीक्षा पास झाली असे गणण्यात येत असे. दुसरे असे, की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःला कुठेही सरकारी नोकरीत अडवून न घेता सार्वजनिक कार्यात पडावे असा त्यांचा इरादा होता. त्यासाठी स्वतंत्रपणे वकिली करणे श्रेयस्कर होते. केवळ या व्यावहारिक कारणामुळे तत्त्वज्ञान हा विषय त्यांना सोडून द्यावा लागला होता, याची टोचणी त्यांच्या मनाला लागून राहिली होती. २ एप्रिल १८९८च्या रोजनिशीमध्ये विठ्ठलरावांनी जी.एच. लेविस याच्या हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथातील काही उतारे लिहून त्यावर स्वतःचे थोडेफार भाष्य केले आहे. अखेरीस ते म्हणतात, “अरेरे! माझा आवडता विषय तात्त्विकशास्त्र हा सोडून मी ऐच्छिक विषय इतिहास व कायदा हे घेतले ही मी केवढी चूक केली! डेक्कन कॉलेजात २-३ वर्षे अध्ययन करून शेवटी मी बी. ए. ला नापास झालो तरी बरे. पण मागच्याच वर्षीचा इतिहास आणि तो घाणेरडा कायदा पुन्हा वाचून (केवळ पोकळ पदवीसीठी!) अखेर विद्याक्रम आटपावयाचा म्हणजे मला फार वाईट आहे!! कसेही करून ह्या युनिव्हर्सिटीचा एखादा शिक्का घेऊन हिच्या कष्टमय कचाट्यातून सुटावे असे मला वाटत होते व आहे. पण माझे आवडते विषयच माझे ऐच्छिक विषय घेऊन मी पास होईन असे मला धैर्य त्या वेळी आले नाही हे किती कमनशीब अथवा नामर्दाई. आवडीपेक्षा सोयीला अधिक मान दिला याबाबत हे फार खडतर शासन झाले.”१ रोजनिशीच्या ह्या नोंदीतच कॉलेजात न जाण्याचे सबळ कारण म्हणजे “माझ्या प्रिय जनाक्काचे शिक्षण व तिजसंबंधी माझी महत्त्वाकांक्षा” असल्याचे नमूद करून त्यात आपल्याला मनाजोगती सिद्धी मिळाली तर हे शासन सोसोण्यास अगदी तयार आहोत असेही त्यांनी नमूद केले आहे. कायदा ह्या विषयावरील व्याख्याने डेक्कन कॉलेजात होत होती. त्या वेळी विठ्ठलराव हे जनुभाऊ करंदीकर, माधवराव हुल्याळ ह्या मंडळींसोबत शनिवारातल्या जमखंडीकरांच्या वाड्यात राहत होते. तेथून फर्ग्युसन कॉलेजात जाऊन तेथून डेक्कन कॉलेजात आठवड्यातून दोन वेळा पायी जावे लागत. टांग्याचे जबर भाडे परवडत नसल्यामुळे व त्या काळी सायकलीचा सुळसुळाट झाला नसल्याने विठ्ठलरावांना पावसाळ्यात ‘भिजत’ आणि उन्हाळ्यात ‘शिजत’ एवढा मोठा पल्ला गाठावा लागत असे. परंतु एवढे अंतर पायी चालण्याचे त्यांना काही वाटत नसे. संगमावर होडी चालू असे. तीत बसून शेतावर जाता येत असे. तिथून डेक्कन कॉलेजात जाण्यास एक जवळची वाट होती. एकदा तर असे झाले, की त्यांना कॉलेजवरून परत निघण्यास रात्र झाली आणि होडी बंद झाली होती. तेव्हा विठ्ठलरावांची धाडशी वृत्ती उफाळून आली. अंगावरचे सारे कपडे डोक्याला गुंडाळून ते पोहत संगमावर आले. विठ्ठलरावांच्या मित्रमंडळींना मात्र त्यांच्या धाडसाचे फार आश्चर्य वाटले.

१८९७ मध्ये पुण्यास प्लेगचा कहर सुरू झाला. शाळा-कॉलेजे बंद झाली. विठ्ठलरावांना मुंबई बी. ए. ची परीक्षा द्यावयास जावे लागणार होते. म्हणून घरच्या मंडळींस त्यांना जमखंडीस घेऊन जावे लागले. या सुमारास मुंबईस हिंदू-मुसलमानांचा दंगा सुरू झाला होता. लोकमान्य टिळकांनी पुण्याला सार्वजनिक गणपतीचा उत्सव राष्ट्रीय पायावर सुरू केला. म्हणून सार्वजनिक जीवन अशांत झाले होते. पुण्यात प्लेगचा उपद्रव जोरात सुरू झाला होता व प्लेगच्या बंदोबस्तासाठी इंग्रज सरकारने सुरू केलेल्या उपाययोजनेचा उपसर्ग तर लोकांना जास्तच होत होता. स्वच्छतेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने पठाण व बलुची लोक बाहेरून बोलावले होते. तेव्हा या पठाण व बलुची लोकांना राहण्यासाठी त्यांना जमखंडीकरांचा वाडा मोकळा करून देण्याचा हुकूम झाला व तो रिकामा करून देणे भाग पडले. १८९७च्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याहून सर्वजण जमखंडीला गेले. विठ्ठलराव तिथूनच बी. ए. ची. परीक्षा देण्यासाठी मुंबईस गेले. परंतु एकंदरीतच दंगे, उत्सव, प्लेग इत्यादी कारणांमुळे वर्षभर वातावरण अस्वस्थ रहिले. ह्या धामधुमीत विठ्ठलरावांच्या अभ्यासाची आबाळ झाली. ते आणि त्यांचे बरेचसे मित्र १८९७ साली बी. ए. परीक्षेत नापास झाले. १८९८ मध्ये पुन्हा बी. ए. च्या परीक्षेचा अभ्यास करणे त्यांना भाग पडले. ठरावीक अभ्यासक्रमाची जरी त्यांना शिसारी आली होती तरी त्यांच्या विचाराच्या व विकासाच्या चक्राची गती मुळीच मंदावली नव्हती.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन जमखंडीहून कॉलेज शिक्षणासाठी १८९३ मध्ये आल्यापासून १८९८ पर्यंतची सहा वर्षे पुण्यात काढली. ह्या अवधीत त्यांचा स्वतःचा प्रार्थनासमाजाकडे ओढा निर्माण होऊन प्रार्थनासमाजाची त्यांनी रीतसर दीक्षा घेतली. त्यांची बहीण जनाबाई हिच्या इंग्रजी शिक्षणाची सोय लागली. ते स्वतः बी. ए. परीक्षा पास होऊन एल्. एल्. बी. च्या अखेरच्या दोन वर्षांचा अभ्यास करण्यास पात्र ठरले. आपण पुढील आयुष्यात सामाजिक कार्य करावे अशी प्रेरणाही त्यांच्या ठायी ह्या काळातच निर्माण झाली. विठ्ठलरावांच्या आयुष्यावर अनुकूल परिणाम करणा-या महत्त्वाच्या घटना पुण्यामध्ये घडल्या, ही वस्तुस्थिती असली तरी पुण्यामध्ये विठ्ठलरावांचे व्यक्तिमत्त्व घडण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, विठ्ठलराव पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी कधी समरस होऊ शकले नाहीत. पुण्यामध्ये ते सदैव परकेच राहिले.
 
पुण्यामध्ये ते आले त्या वेळेलाच त्यांच्या मनाची धारणा चांगल्या प्रकारे झालेली होती. घरातील संस्कारामुळे वारकरी संप्रदायाच्या उन्नत धर्मविचाराचा संस्कार त्यांच्या मनावर झाला होता व त्यांची जातिभेदातीत अशी उदारमतवादी सामाजिक भूमिका तयार झाली होती. त्या काळात पुण्यातील वातावरण असे होते की, पुण्यात बघितलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींबाबत त्यांच्या मनाचा मेळ बसण्याऐवजी सामान्यतः प्रतिकूलतेचीच भावना निर्माण होताना दिसते. पुण्याशी घडणा-या ह्या विसंवादातून विठ्ठलरावांच्या व्यत्किमत्त्वाचा प्रगल्भपणा ठळकपणाने जाणवतो.

महात्मा जोतीबा फुले ह्यांनी १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली व १८५१ मध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा उघडली. महात्मा फुले ह्यांचे अस्पृश्यांसाठी सुरू केलेले काम युगप्रवर्तक स्वरूपाचे होते. परंतु १८५६ नंतर अस्पृश्यांच्या शाळेचे काम आपले सहकारी गावंडे, वाळवेकर, परांजपे या सहका-यांवर सोपवून त्यांना बाहेर पडावे लागले. कालांतराने हे शाळेचे काम बंद पडले. १८७० नंतर न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्याच्या सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केला. सार्वजनिक सभेच्या द्वारा शेतक-यांवर होणा-या अन्यायाची दाद लागावी यासाठी प्रयत्न केले व सार्वजनिक सभेचे काम नावारूपाला आणले. परंतु बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला तो मुळी रानडे आणि त्यांच्यासारखे मवाळ ह्यांना विरोध करण्याचा पवित्रा घेऊनच. टिळकांनी हरएक प्रयत्न करून रानड्यांच्या वर्चस्वाखाली असलेली सार्वजनिक सभा स्वतःच्या ताब्याखाली आणली व शिवरामपंत परांजपे यांना सार्वजनिक सभेचे चिटणीस केले.

महात्मा जोतीबा फुले यांनी १८७३ मध्ये ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. बहुजन समाजामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांचे कार्य चालले होते. परंतु जहाल राष्ट्रवादी विचारसरणीच्या चिपळूणकरांसारख्यांच्या विरोधामुळे शिकलेल्या वर्गात त्यांचा प्रभाव पडला नाही. फुल्यांच्या व्यापक विचारसरणीकडे दुर्लक्ष होऊन फुले ब्राह्मणविरोधातच काम करतात अशा प्रकारचा त्यांच्याबद्दलचा ठसा उमटविला गेला. फुल्यांनंतर अस्पृश्यवर्गात शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने खेड्यापाड्यांत शाळा व वसतिगृहे चालवण्याचा उपक्रम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बारामतीचे रामचंद्र अण्णाजी कळसकर हे होत. खेडेगावात आणि अस्पृश्य मानलेल्या लोकांत शिक्षणप्रसाराचे कार्य करणारी त्या काळात अस्तित्वात असलेली एकमेव संस्था कळसकर हे चालवीत होते. प्रथमतः त्यांनी १८८५च्या सुमारास ‘वांगी व्हिलेज एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था स्थापन करून आपल्या कार्याला प्रारंभ केला. नंतर तिचे ठाणे बारामती येथे हालवून संस्थेचे रूपांतर ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ असे केले. ह्या सोसायटीच्या कळस, अकोले, काजळ, मेघळी, कटफळ, बारामती ह्या गावी एकंदर आठ शाळा चालविल्या जात होत्या. त्यांपैकी सहा निव्वळ मराठी शाळा वरील खेड्यांत चालविल्या जात होत्या. एक इंग्रजी व एक उद्योगशाळा बारामती येथे चालविली जात होती. ह्या आठ शाळांपैकी पाच अतिशूद्रांसाठी होत्या व त्यामधून १४६ विद्यार्थी १८९८च्या सुमारास शिकत होते. न्या. रानडे ह्यांचे संस्थेस मार्गदर्शन व साह्म असे. परंतु दुष्काळाच्या तडाख्यात ह्या संस्थेचीही आर्थिक स्थिती बिकट झाली होती. न्या. रानडे यांच्याप्रमाणेच अन्य प्रार्थनासमाजीयांची कळसकरांच्या कार्य़ाला सहानुभूती व प्रोत्साहन असे.२ संस्थेला मदत करावी अशी वारंवार आवाहने सुबोधपत्रिकेमधून पुढील पंधरा-एक वर्षे तरी केलेली आढळतात.

१८९८ ह्या वर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना बी. ए. च्या परीक्षेला पुन्हा बसण्याची पाळी आली होती. अभ्यासाची तीच तीच पुस्तके डोळ्यांसमोर धरण्याचा त्यांना तिटकारा आला होता. न वाचलेल्या विषयावरची पुस्तके वाचावीत; नवीन ज्ञान मिळण्याच्या अपेक्षेने व्याख्याने ऐकावीत; ताजी नियतकालिके, वृत्तपत्रे वाचावीत व त्यातून आपल्या विचारासाठी खाद्य मिळवावे हे विठ्ठलरावांना अधिक रूचत होते. त्यांनी १८९८-९९ मध्ये लिहिलेल्या रोजनिशीत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्याची शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अवस्था कोणत्या प्रकारची होती; ह्या विविध क्षेत्रांत संस्था कोणत्या प्रकारची भूमिका ठेवून कार्य करीत असत याबद्दलची माहिती येते, त्याचप्रमाणे बघितलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींबाबत विठ्ठलराव स्वतःच्या प्रतिक्रियाही प्रकट करताना आढळतात. त्यांच्या या प्रतिक्रियांवरून खास पुणेरी मंडळींहून त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक एवढेच नव्हे तर धार्मिक बाबतीतही दृष्टिकोण वेगळा होता; पुणेरी मंडळींच्या भूमिकेच्या विरुद्ध स्वरूपाचा होता असे जाणवते. कोणत्याही बाबतीत मत बनविताना प्रभावी मताचे त्याचप्रमाणे तथाकथित विभूतींचे दडपण त्यांच्या मनावर पडत नाही. उलट मोठ्या समजल्या जाणा-या माणसांचेही स्वतंत्रपणाने ते मूल्यमापन करतात. ह्या सगळ्या प्रतिक्रियांतून विठ्ठलरावांच्या मताचा स्वतंत्रपणा आपणास जाणवत राहतो.
 
ह्या वर्षी अभ्यासक्रमाबाहेरचे त्यांचे वाचन उत्साहाने चाललेले होते. तत्त्वज्ञान हा त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला नसतानाही लेविसच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे ते मन लावून वाचन करतात. मराठेशाहीच्या अवनतीचे खापर एका बाजीच्या माथी न फोडता सर्व महाराष्ट्रीय त्याला जबाबदार असल्याचे सांगून आपली ऐतिहासिक दृष्टी व निःपक्षपातीपणा प्रकट करतात. प्रो. बेनच्या अर्थशास्त्रावरील पुस्तकाच्या विविध अंगांवर ते अभिप्राय देतात. त्यांना पसंत पडलेल्या भागाचे कौतुक करतात. परंतु प्रो. बेनची सोशॅलिझमवरची टीका त्यांना मंजूर नाही. भांडवलशाहीचा अतिरेक व मजूरवर्गाची उपेक्षा यांच्याविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून सोशॅलिझमची बाजू सर्वांनी उचलून धरावयास पाहिजे असे त्यांना वाटते. डेव्हिड लिव्हिंगस्टनचे चरित्र वाचून त्याचा दृढ निश्चय, स्वीकृत कार्यावरील निष्ठा इत्यादी नैतिक गुणांनी ते भारावून जातात. प्रत्यक्ष अनुभवाचा आधार नसलेल्या व केवळ कल्पनेने निर्माण केलेल्या पोतळ कादंब-यांचे वर्णन “घरकोंबड्या कादंबरीकारांनी लिहिलेली खोटीनाटी चरित्रे” अशा शब्दांत करतात. मात्र वास्तवाचे भेदक चित्रण करणारे व प्रसाद्युक्त मराठी भाषा लिहिणारे कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांच्याबद्दल त्यांच्या मनात कादंबरीकार म्हणून आदरातची भावना आहे. लिव्हिंगस्टनच्या चरित्रामध्ये इंग्रजांच्या सुधारणेचे, द्यार्द्रतेचे, दृढ निश्चयाचे आणि मानसिक व शारीरिक शक्तींचे धडधडीत उदाहरण ह्या चरित्रनायकात दिसते असे ते नमूद करतात. लिव्हिंगस्टनची अपार परार्थता, उद्योगाची एकतानता आणि मानलेल्या देवावरची शुद्ध बावनकशी श्रद्धा त्यांना कौतुकास्पद वाटते.

इतिहास हा तर त्यांच्या आवडीचा तसेच अभ्यासाचा विषय होता. मल्हार रामराव चिटणीस यांची बखर वाचून चिटणीसांनी उपलब्ध कागदपत्रांचा नीट उपयोग केला नाही अशी शंका ते प्रकट करतात. सर्व प्रसंगी पेशव्यांची केलेली तरफदारी त्यांना पक्षपातीपणाची वाटते. “कोठे शिवाजीने केलेला महाराष्ट्रशाईचा उद्य व कोठे दुस-या बाजीने चालविलेला अनागोंदीचा अंत!!! पण या राक्षसी भेदाची जबाबदारी एका शिवाजीवर नाही की एका बाजीवर नाही तर सर्व महाराष्ट्रीयांवर आहे, एवढे तरी पक्के समजल्यास पुष्कळ झाले. नाही तर बाजीस शिव्यांची लाखोली व शिवाजीचे महोत्सव यातच आम्ही दमून जाणार,”३ असे आपले मत नोंदवितात. ऐतिहासिक घटनांकडे निःपक्षपातीपणे बघण्याचा, विभूतिपूजेपासून दूर राहण्याचा यथायोग्य दृष्टिकोण विठ्ठलरावांच्या  ठिकाणी त्यांच्या विद्यार्थिदशेत तयार झालेला दिसून येतो.

१८९८ मध्ये मोजकीच वृत्तपत्रे निघत होती. १८८१ पासून टिळकांचा केसरी निघू लागला होता. १८८८ पासून आगरकरांचे सुधारक पत्र सुरू झाले होते. सनातनी पक्षाचे पुणेवैभव साप्ताहिकरूपात १८८० पासून निघत होते. अशात शि. म. परांजपे ह्यांनी साप्ताहिक काळ सुरू केला. काळाबद्दल विठ्ठलरावांचे काहीसे प्रतिकूल मत निर्माण झाले. काळाचे पहिले चार अंक वाचल्यानंतर विठ्ठलरावांनी आपली प्रतिक्रिया सुस्पष्टपणे नमूद केली आहे. “काळ म्हणजे केसरीची नक्कलच दिसते. पण केसरीचा स्वभाविक खरमरीतपणा, जाज्ज्वल्य अर्थगांभीर्य, शब्दाचा नेमकेपणा व साधी ढब, नखरेबाज अलंकाराविषयी निष्काळजीपणा वगैरे चांगले गुण काळात तंतोतंत उतरलेले दिसत नाहीत. पण केसरीचा कुत्सितपणा व व्यक्तीला व पक्षाला टोचून लिहिण्याची सवय मात्र ब-याच ठिकणी काळात चमकते.’’४ काळ पत्राबद्दलचा अभिप्राय नमूद करताना विठ्ठलरावांनी केसरीचे चांगले गुण आणि दोष नेमकेपणाने दाखविले होते. ह्या निमित्ताने लिहिताना वृत्तपत्राची भूमिका व नीती कशी असावी ह्याबद्दल मार्मिक विचार प्रकट केले आहेत. “काळाचे चार अंक वाचले परंतु मनाला तल्लीन करणारा एखादा विचार किंवा विकार मला दिसला नाही” असे ते म्हणतात. वृत्तपत्रात सखोल विचार व उन्नत भावना प्रकट व्हावी ही अपेक्षाच ते एक प्रकारे बोलून दाखवितात. आपली वृत्तपत्रे एकांगी विचार करणारी आहेत याबद्दलची नाराजी प्रकट करताना ते लिहितात, बहुतेक पत्रांना पक्षाघात झालेला आढळत आहे. ख-या स्थितीचे दिग्दर्शन करणारा व आपले मत निर्भयणे प्रकट करणारा आगरकरांचा अवतार त्यांना अपेक्षित होता. खरी स्थिती कळणे ही एक अडचण व कळल्यावर प्रामाणिकपणे व बिनधोक प्रसिद्ध करणे ही खडतर अडचण त्यांना वाटत होती. नाइंटिन्थ सेंच्युरी ह्या मासिकाच्या फेब्रवारी १८९८ मधील जी. एम. चेस्नी ह्यांनी देशी पत्रावर केलेल्या टीकेचा निर्देश ते करतात. प्रस्तुत लेखात हिंदुस्थानातील वर्तमानपत्रे केवळ राजकारणापुरती बंदिस्त असून खेळ, संगीत, शास्त्र इत्यादी विषयांना जागा देत नाहीत. एवढेच नव्हे तर हा शेतकीप्रधान देश असून शेती विषयालाही जागा देत नाहीत. येथील लोकांना इंग्रजांचे सरकार उलथून टाकावयाचे आहे; परंतु पर्यायी व्यवस्थेची कल्पना त्यांच्या डोळ्यांसमोर नाही. दर दोन माणसामागे एकाची आकांक्षा सरकारी नोकरी मिळावी ही असल्याने नोकरीच्या जागा वाढवा अशी त्यांची हाकाटी असते अशा प्रकारच्या येथील लोकांच्या उणिवा आणि विसंगती त्या लेखात स्पष्टपणाने दाखवून दिल्या आहेत.विठ्ठलरावांना त्यांनी दाखविलेल्या उणिवा मान्य होत्या व हिंदुस्थानातील वृत्तपत्रांनी आपली वृत्ती व नीती सुधारली पाहिजे असे तीव्रपणाने वाटत होते.

ह्या सुमारास विठ्ठलराव धर्माकडे जोराने ओढले गेले होते. धर्म विषयाला वाहिलेले एखादे वर्तमानपत्र असावे असे त्यांना ताव्रतेने वाटत होते. २२ मे १८९८च्या रोजनिशीत त्यांनी लिहिले, “हल्ली देशात वर्तमानपत्रांचा दररोज इतका केर पडतो पण त्यात धर्माच्या नावाने एक निर्माल्यही आढळत नाही.” ४ मे १८७३ पासून वस्तुतः प्रार्थनासमाजाचे मुखपत्र सुबोधपत्रिका निघू लागले होते.

अभासक्रमाबाहेरील अवांतर वाचन करण्याप्रमाणेच विठ्ठलराव वेगवेगळ्या विषयांवरील भाषणे उत्साहाने ऐकत. कॉलेजमधील प्रासंगिक वसंत व्याख्यानमालेतील त्याचप्रमाणे नव्याने सुरू झालेल्या शिवजयंत्युत्सवातील भाषणे ते नेमाने ऐकत. यातील बहुसंख्य भाषणे त्यांच्या पसंतीला उतरली नाहीत. त्यांना आवडलेल्या भाषणांपैकी एक म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचे ‘इंग्लंडातील व हिंदुस्थानातील शिक्षण’ या विषयावरील इंग्रजीत झालेले भाषण. ‘एकाग्रतेने भाषण ऐकण्याची उत्कंठा दाबवेल तितकी दाबवून’ त्यांनी ह्या भाषणाची टिपणे घेतली व त्याचा तीन-चार पानी गोषवारा त्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिल १८९८ रोजी लिहिलेल्या रोजनिशीत दिला आहे. गोखल्यांनी सांगितलेले इंग्लंडातील शिक्षणाचे प्रकार, प्रसार व पद्धत ते नमूद करतात. सातव्या वर्षापासून मुलांना तेथे ‘बोर्ड स्कुला’त सक्तीचे प्राथमिक शिक्षण मोफत मिळते. शिक्षाणाच्या प्रसारामुळे गाडीवाले मजूर इत्यादी कामकरी फावल्या वेळात वर्तमानपत्रे वाचताना आढळतात. वरच्या वर्गामधील ऐपत असणारे लोक मुलांना ‘पब्लिक स्कुला’त पाठवितात. तेथिल शिक्षणपद्धती मनोवेधक असून मुलांच्या ठिकाणी नागर गुणाचे परिणाम करणारी असते. तेथे मानसिकतेइतकेच शारीरिक शिक्षणाकडेही लक्ष पुरविले जाते. कॉलेजमध्ये प्रोफेसरांची विद्वता व योग्यता फार वरच्या दर्जाची असते. तेथील शिक्षणविशेषाच्या अनुरोधाने इंग्रज माणसाच्या ठिकाणी असणा-या नैतिक शक्तीची मीमांसा त्यांनी केली. गोखले यांच्या वाणीच्या विलासास केवळ त्यांचे जिव्हाचापल्यच कारणीभूत नसून त्यांच्या अंतःकरणाची मार्मिकता व रसिकताही आहे हे उघड दिसते, असे म्हणून केवळ भाषेवरचे प्रभुत्व आणि बौद्धिकता यांच्या जोरावर व्याख्यान चांगले होत नसते असे सुचवितात. मात्र गोखल्यांच्या व्याख्यानाची तारीफ करूनही शिंदे आपले विवेचकत्व, बहुश्रुतता व मूल्यमापनाचा स्वतंत्रपणा प्रकट करतात. व्याख्यानाचा गोषवार दिल्यावर अखेरीस “गोखल्यांनी तेथील शिक्षणपद्धतीचे वर्णन केले आहे ते सर्व एकतर्फीच दिसते, कारण खुद्द इंग्लंडातही तेथील पद्धतीबद्दल सारखी ओरड आहे. ते केवळ निर्दोष असेल असे मुळीच वाटत नाही.”५ असा स्वतःचा अभिप्राय देतात. ह्या एकतर्फीपणाची मीमांसा करताना ते म्हणतात की, येथील पद्धती इतकी दुष्ट आहे की हीत रुळलेल्यास तेथल्या पद्धतीतले फार दोष दिसणे संभवनीय नाही.

शिवजयंती उत्सवातील व्याख्याने त्याचप्रमाणे वसंत व्याख्यानमालेतील व्याख्याने यावरील शिंदे यांचे अभिप्राय त्यांच्या व्यापक, उदारमतवादी दृष्टिकोणाचे, प्रगल्भ मनाचे व चोखंदळ अभिरुचीचे द्योतक आहेत. तत्कालीन सुशिक्षित पुणेकर समाज आणि विठ्ठलराव यांच्या दृष्टिकोणात व अभिरुचीत फार मोठी तफावत होती हे जाणवते. सार्वजनिक सभेसारख्या संस्थेतून न्यायमूर्ती रानड्यांसारख्यांनी अंग काढून घेतले होते. लोकमान्य टिळकांचा प्रभाव तेथेही पडला होता. ह्या वर्षी शि. म. परांजपे वसंत व्याख्यानमालेचे चिटणीस होते ही गोष्ट त्याचीच द्योतक आहे. त्या वेळीचा पुण्यातील सर्वसामान्य सुशिक्षित समाज राष्ट्रवादी झाला होता खरा; परंतु सामाजिक बाबतीत सुधारणाविरोधी, प्रतिगामी, रूढ धर्माचे म्हणजे एक प्रकारे सनातन गोडवे गाणारा बनला होता. व्यापक, उन्नत धर्मकल्पना फारशी लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. बहुजन समाजाचे हित आणि सुधारणा यांकडे फारसे कुणाचेच लक्ष नव्हते. एवढेच नव्हे तर त्याची त्यांना जाणीवही दिसत नव्हती. तत्कालीन वातावरण असे असल्याने व विठ्ठलरावांची संवेदनशीलता पुणेकरांहून भिन्न असल्याने त्यांचे व्याख्यानावरील त्याचप्रमाणे श्रोतृवर्गासंबंधीचे अभिप्राय प्रतिकूल पडलेले दिसतात.

सनातनी वृत्तीचा तत्कालीन पुणेरी नमुना प्रो. जिन्सिवाले यांच्या रूपाने पाहावयास मिळतो. शिवजयंती उत्सवात प्रो. जिन्सिवाल्यांचे व्याख्यान झाले. भाषणातून विद्यार्थ्यांना त्यांनी रास्त उपदेश केला. परंतु एक-दोन उदाहरणे जी घेतली ती कुत्सित व खोडसाळपणाची होती. एका संदर्भात उदाहरण देताना प्रो.जिन्सिवाले म्हणाले, “तुम्ही आपली सोय पाहिली पण लोक मला हळदीकुंकवाला बोलावीत नाहीत ना, असे एक पुनर्विवाहिता आपल्या नव्या नव-यास बोलल्यावर मग त्यास पश्चात्ताप होतो.” हे उदाहरण ऐकल्याबरोबर काहींची तोंडे खुलली व टाळ्यांचा गजर झाला. ह्या प्रसंगावर भाष्य करताना विठ्ठलराव शिंद्यांनी लिहिले आहे, “पुण्याच्या सार्वजनिक सभांतून एखाद्या वक्त्यास टाळ्या मिळाल्या की त्याने काहीतरी पोरकटपणा (केला) असावा असे बाहेरच्याने समजावे अशी स्थिती झाली आहे.”६ पुण्यातील सर्वसाधारण श्रोतृवर्ग आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचे दृष्टिकोण व अभिरूची यामध्ये फरक जाणवून देणारा हा प्रसंग आहे. शिवजयंती उत्सवातील प्रो. परांजपे यांचे जे पुराण झाले त्याबद्दलची शिंदे यांची प्रतिक्रियाही अशीच तिखट आहे. ते म्हणतात, “बिचा-यात एक म्हणजे एकच गुण दिसला. तो हा की ‘सुधारक’ नाही! टाळ्या मिळण्याला इतकेच बस्स आहे! लेखाप्रमाणेच यांचे भाषणही बुळबुळीत, निःसत्त्व, असंबंद्ध, अशुद्ध, तुटक, विपुल व पोकळ शब्दांनी भरलेले असे असते.”७ वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांमुळे बहुशः त्यांची निराशाच झाली. सेटलूर यांच्या विचारात ‘नवेपणा अगर खोलपणा’ आढळून न आल्याने शिंदे यांचे समाधान होत नाही. न. चि. केळकर यांचा सुधारणेचा बाबतीतला मोघमपणा त्यांना न आवडून त्यांच्या व्याख्यानाचे “काहीतरी दुतोंडी अर्धवट भाषण करून वेळ मारून नेण्याची व शिंगे मोडून वासरात शिरण्याची कला गुरूपासून चेल्याने चांगली साधली आहे, असे वर्णन ते करतात. प्रो. परांजपे यांनी केलेले विधान तर भयंकरच होते. ते म्हणाले की, “सती बंद झाल्यामुळे विधवाविवाहाची अडचण उपस्थित झाली.” सेटलूरही त्याच धर्तीवर बोलताना म्हणाले, “आता विधवाविवाह सुरू होईल तर पाश्चात्त्य समाजातल्या घोर अपायकारक गोष्टी उद्भवतील.” वसंत व्याख्यानमालेचे चिटणीस शि. म. परांजपे झाले होते व मालेवर सनातनी पक्षाने कब्जा मिळविला होता याचे गमक म्हणजे या प्रकारची भाषणे होत.

मालेतील दहाबारा व्याख्याने ऐकल्यानंतर एकंदरीत अशा मालेचे स्वरूप कसे असावे याबद्दल गंभीरपणे ते विचार करताना दिसतात व तिच्या उथळ स्वरूपाबद्दल तीव्र नाराजी प्रकट करतात. “माझ्या मते असल्या मालेच्या द्वारा काही ख-या विद्येचे विलास लोकांपुढे आले पाहिजेत. नुसते वक्तृत्व पाजळणे किंवा शाळेच्या चार पोरांकडून टाळ्या घेणे, किंवा सर्वांस माहीत असलेल्याच चालू चळवळीचे पाणचट चर्वितचर्वण करणे वगैरेंकरता ही माला नव्हे. महाराष्ट्रातल्या चार विद्वान डोक्यांत ज्या काही विचारांची वर्षभर घालमेल होत असेल ती सर्व ह्या मालेच्या रूपाने लोकांपुढे आली पाहिजे. म्हणजे मालाही ह्या अंतःस्थ उलाढालीचे कार्य झाली पाहिजे.” मालेतील व्याख्यानातून प्रकट होणारी विचारांची दिशा शिंदे यांना पटणारी नव्हती. कारण “यंदाच्या सर्व मालेचा रोख बहुतेक निवृत्त मार्गाकडेच दिसतो,” असे त्यांना जाणवले. “आमचे पूर्वीचे चांगले” हा सूर त्यांना पटणारा नव्हता. न रूचणारा स्वतंत्र विचार प्रकट झाला तर सभा उग्र रूप धारण करील ही भीतीही व्याख्यात्यांच्या मनात असायची. “एकंदर आमच्यात स्वतंत्र विचार कमी व जर काही असलाच तर तो पुण्याच्या लोकांपुढे उघडपणे येण्याचा संभव मुळीच नाही” असे ते आपले दुहेरी निरीक्षण नमूद करतात. ही सारी व्याख्याने कोणी थट्टेखोराने जर छापून काढली तर त्यांची खरी योग्यता कळेल असे उपहासाने ते नमूद करतात.८

विठ्ठलरावांच्या ठिकाणी राष्ट्राभिमानी वृत्तीचा आविष्कार स्वभाविकपणे घडत होता. सामाजिक बाबतीत आणि सामाजिक सुधारणेच्या बाबतीत पुरोगामी असणारे विठ्ठल रामजी शिंदे राष्ट्रीय बाबतीत जहाल होते. नाइंटिन्थ सेंच्युरीच्या अंकामध्ये ‘भारतीय सरहद्दीवर कायमची शांतता’ ह्या विषयावर मेजर जी. जे. यंगहजबंड ह्याचा लेख वाचून १ एप्रिल १८९८च्या रोजनिशीमध्ये ते संतापून नोंद करतात. सरहद्दीवरील टोळ्यांतील आदिवासींचे संपूर्ण निःशस्त्रीकरण करून त्यांना सुसंस्कृत (कायमचे गुलाम) बनविणे व त्यांत्याकडून मोफत सक्तिने पक्के रस्ते तयार करून घेणे हा यंगहजबंडने सुचविलेला मार्ग त्यांना संतापजनक वाटून त्यावर ते टीका करतात. अशा प्रतिक्रियांतून त्यांचा जहाल राष्ट्रवादी दृष्टिकोण प्रकट होतो.

समाजात आजूबाजूला घडणा-या घटनांचे त्यांच्या मनावर तीव्र पडसाद उमटतात. समाजामध्ये दिसून येणारी जातीयता त्यांना चीड आणणारी वाटते. बुधवारात कोतवाल चावडीजवळ एक रामदासी बोवा पृथ्वीच्छंदी श्लोक ठेक्यात म्हणत जात असताना तेथील रिकामटेकड्या लोकांनी बुवांना अडवून त्यांची जात विचारली व ते गौड ब्राह्मण आहेत असे समजता नगररस्त्यातून ब्राह्मणाकडून पाया पडून का घेता असे मोठ्या उर्मटपणे विचारले व त्यांची अती टर उडविली. ह्या जात्यभिमान्याला दक्षिणी ब्राह्मण वानप्रस्थाश्रमी गौड ब्राह्मणाच्या पाया पडलेले खपले नाही. हा जातिमत्सर बघून विठ्ठलरावांना सात्त्विक संताप आला. २९ मे १८९८च्या रोजनिशीत त्यांनी मुंबई येथील प्रार्थनासमाजाविषयी त्यांच्या मनात निर्माण झालेली प्रतिकूलतेची भावना नमूद केली आहे. समाजाचे उद्देश, भाषण व मेंबरांची कृती यांमधील विरोध त्यांना चीड आणण्यासारखा वाटतो. समाजात कसल्याही प्रकारे जातिभेद असता कामा नये, ही भूमिका असताना समाजातील मंडळी जातिभेद उघडपणे झुगारण्यास तयार नाहीत. त्यामुळे नुसती सुधारणेची भाषा करणारे सुधारक व प्रार्थनासमाजातील मंडळी त्यांना सारखीच दांभिक वाटतात.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा वेगळेपणा आणखी एका बाबतीत विशेषत्वाने जाणवतो. ते स्वतः जवळ जवळ ग्रामीण असणा-या जमखंडीसारख्या गावातून आलेले होते. ग्रामीण भागातील शेतक-यांची, गरिबांची, स्त्रियांची दुःखे त्यांना नीट माहीत होती. ती त्यांच्या अंतःकरणाला झोंबणारी होती. मात्र पुण्यात सभा-संमेलनांतून जो विचार प्रकट होत असे अथवा वर्तमानपत्रांतून जो विचार होत प्रसृत होत असे त्यामध्ये त्यांना बहुजन समाजाच्या हिताचा विचार आढळत नसे. त्यांना वाटत असे की, व्याख्यात्याने नवीन शास्त्रीय शोधाचे समाजास द्यावे. प्रार्थनासमाजाच्या उच्च धर्ममताचा प्रसार तर गावंढळात म्हणजे सर्वसामान्य बहुजन समाजात होणे त्यांच्या दृष्टीने निकडीचे होते. ह्या सा-यांतून विठ्ठल रामजींची वैचारिकता ही पुण्याच्या तत्कालीन सुशिक्षित समाजापेक्षा वेगळ्या प्रकारे बनलेली होती हे जाणवते. त्या वेळच्या व्याख्यानांतून, वर्तमानपत्रांतून, जे विचार प्रकट होत होते ते सामान्यतः परंपराभिमानातून निघालेले सनातनी वा राष्ट्रवादी विचार असायचे. मग त्यांचा हा जो व्यापक दृष्टिकोण बनलेला दिसतो त्याला कारणीभूत त्यांच्या घरचे उदारमतवादी संस्कार, त्यांचा व्यापक सहानुभाव, त्यांचा स्वाभाविक चांगुलपणा व त्यांनी केलेले चिंतनच असावे. रा. कळसकरांसारख्या उदारमनस्क कर्त्या पुरुषाचा सहवास त्यांना जो मिळाला तो ह्या बाबतीत साह्मकारक ठरला असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून महात्मा फुले यांनी अस्पृश्यवर्गासाठी जे काही कार्य केले त्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली असणे शक्य आहे.

विठ्ठल रामजी शिंदे हे उत्साहाने एवढे भारलेले असायचे की, नुसता विचार करून गप्प बसणे त्यांच्याबाबतीत केवळ असंभवनीय. कळसकरांच्या उदाहरणाने ते प्रभावित झाले होते व आपणही अशाच प्रकारचे काहीएक काम स्वतंत्र मंडळी स्थापन करून करावे असे त्यांना वाटत होते व त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेऊन आपले मित्र गोविंदराव सासने, केशवराव कानिटकर, माधवराव हुल्याळ या मित्रांसमवेत वाटाघाट चालविली होती. आपले भावि जीवन स्वार्थत्यागपूर्वक सार्वजनिक कार्याला वाहून घ्यावे याबद्दल त्यांची पूर्वतयारी या काळातच झालेली दिसते.

जीवनाच्या सगळ्या अंगांकडे विठ्ठल रामजी शिंदे यांचा ओढा होता. आपण राजकारणात पडावे व राष्ट्रकार्य करावे असे त्यांना वाटत होते. आपण स्वार्थत्यागपूर्वक समाजसुधारणेचे कार्य करावे ही प्रबळ ऊर्मीही त्यांच्या ठिकाणी होती व उन्नत स्वरूपाचे धर्मकार्यही करावे अशी ओढ त्यांच्या मनाला लागून राहिली होती. ह्या तीनही बाबींचा एकमेकांत विरोध आहे असे तर त्यांना वाटत नव्हतेच, उलट या तीनही गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये एकमेळ होऊन गेला होता.
        
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, गो. मा. पवार (संपा.), मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, १९७७, पृ. ११-१२.
२. सुबोधपत्रिका, २४ डिसेंबर १८९९.
३. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८-९.
४. तत्रैव, पृ. १६.
५. तत्रैव, पृ. २२.
६. तत्रैव, पृ. २३.
७. तत्रैव, पृ. २३.     
८. तत्रैव, पृ. ३०.

पदवी परीक्षा

१८९८ हे वर्ष विठ्ठलरावांच्या जीवनात अंतःस्थ खळबळीचे तसेच बाह्य उलाढालींचे गेले. सार्वजनिक काम प्रत्यक्षात कसे सुरू करता येईल याबद्दल गंभीरपणे त्यांची वाटाघाट आपल्या मित्रांसमवेत चालाली होती. वैवाहिक जीवनामध्ये पडलेला नाजूक पेच कसा सोडवावा ह्या विचाराने त्यांच्या मनामध्ये खळबळ माजून राहिली होती व त्यांचे अंतःस्थ भावजीवन ढवळून निघाले होते. लौकिक जीवानातील या प्रश्नाइतकाच आध्यात्मिक जीवनातील प्रश्न निकराचा होऊन बसला होता व प्रार्थनासमाजाची रीतसर दीक्षा घेऊन तो प्रश्न त्यांनी अखेरीस मनासारखा सोडविला.

आदल्या वर्षी बी. ए. च्या परीक्षेला बसून विठ्ठलरावांना अपयश पदरी घ्यावे लागले होते. परीक्षेचा तोच अभ्यास १८९८ मध्ये करणे त्यांना भाग पडले. एक तर सतत नवे वाचावे, नव्या विचारांचा परिचय करून घ्यावा ही उत्कंठा असणा-या विठ्ठलरावांना तीच ती अभ्यासाची जुनी पुस्तके डोळ्यांसमोर धरणेही तिटका-याचे वाटत असणार. परंतु एकदाची या परीक्षेच्या फे-यातून सुटका करून घेणे भाग असल्यामुळे त्यांनी अभ्यास करून मुंबई विश्वविद्यालयाची ही परीक्षा दिली. विठ्ठलरावांना एकदा इंटरमीजिएटच्या परीक्षेत व त्यानंतर बी.ए.च्या परीक्षेत असे दोनदा अपयश पचवावे लागले होते. ह्या अपयशामुळे व्यावहारिक पातळीवरून त्यांना दुःख वाटले असले तरी त्यांचा स्वतःबद्दल वाटणारा खोलवरचा आत्मविश्वास अभंग राहिला होता. उलट विश्वविद्यालयाच्या परीक्षेच्या चढाओढीच्या पद्धतीचा त्यांना तिटकारा आला होता. अशा पद्धतीने जे स्कॉलर ठरतात ते पुढील आयुष्यक्रमात मोठ्या विद्वतेची कामे करताना दिसत नाहीत हे त्यांना जाणवत होते. त्याचे कारणही त्यांनी नमूद केले आहे. “याचे कारण ऐन तारुण्यात त्यांची अनैसर्गिक पिळवणूक होऊन ते खच्ची होतात. नुसत्या शर्यतीने कोण विद्वान होईल? विद्वता हा नैसर्गिक विकास आहे. शर्यतीचे घोडे आणि औताचे घोडे यांची तुलना केली तर अश्वशक्ती (Horse Power) कुणाची व का जास्त असते हे कोळून येईल.”१ बी.ए. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर तर परीक्षापद्धतीबद्दलची ही घृणा त्यांच्या मनामध्ये दाटून आली. शेवटचा पेपर संपल्यावर युनिव्हर्सिटीच्या पटांगणावरील भिंतीवर बसून युनिव्हर्सिटीच्या राजाबाई टॉवरकडे ते पाहत होते. हा टॉवर त्यांना प्राचीन बाबिलोनिया शहरातील बॉल मरढॉक नावाच्या उग्र देवतेचा पुतळाच भासला. त्या पुतळ्याच्या हातात एक तापलेला लाल तवा असून गावातील मातांनी आपल्या प्रथम जन्मलेल्या मुलास त्यात टाकून आहूती देण्याची चाल होती. तशीच चाल ह्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच्या खाईत आपला पोटच्या पोरास होरपळून काढण्याची आहे अशी त्यांची त्या वेळी झालेली कटू आणि जहाल भावना त्यांनी नमूद केली आहे.

१८९८ सालात अखेरीस बी. ए. ची परीक्षा विठ्ठलराव पास झाले. कायद्याच्या पेपरामध्ये फर्स्टक्लासचे मार्क पडून फर्स्ट एल्. एल्. बी. ही परीक्षाही ते पास झाले.

संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ १०९. 

पत्रांचा विरंगुळा

लंडनहून ऑक्सफर्ड येथे परतल्यानंतर विठ्ठल रामजींनी सुबोधपत्रिकेसाठी लंडनचे वर्णन करणारा लेख लिहिला व १० तारखेस पाठवून दिला. त्यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ झाली होती. अशक्तपणा जाणवत होता. भूक लागेनाशी झाली. त्यांनी ११ नोव्हेंबरपासून म्हणजे दोन महिने मांसाहार आजिबात सोडला होता. लंडनहून मिटोज नावाचे पौष्टिक अन्न मागविले होते ते त्यांना रुचले नाही व पचलेही नाही. नाइलाजाने व अनिच्छेने त्यांनी मांसाहारी जेवण घ्यायला सुरुवात केली.१ त्यांची शरीरप्रकृती बरी नव्हती त्याचप्रमाणे त्यांच्या मनालाही स्वस्थता नव्हती. करमेनासे झाले. उदास वाटू लागले. कुटुंबियांवर उत्कटत्वाने प्रेम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. इंग्लंडला येण्याच्या वेळी मनाची जी अवस्था झाली होती तिचे वर्णन त्यांनी एका पदात केले होते.
“तरुण भार्या, तान्हे बालक
वृद्धही माता पितरे।
अनाथ भगिनी, बंधु धाकुटा।
आश्रित बांधव सारे।
आलो टाकुनिया पदरी। घेई दयामया।।२
घरच्या सगळ्या माणसांना ते नियमितपणाने पत्रे पाठवीत होते. आपल्या अंतःकरणातील भावना प्रकट करण्याचा तेवढाच एक मार्ग त्यांना उपलब्ध होता व त्यांच्याकडून येणारी घरच्यांची, मित्रमंडळींची पत्रे वाचणे हा त्यांच्या जिवाला मोठाच विरंगुळा होत. लंडनला पोहोचल्याबरोबर सगळ्या जवळच्या मुंबईकर प्रार्थनासमाजीय मित्रांना व कोरगावकरांसारख्या वडिलधा-यांना, तसेच घरी बाबांना, जनाबाईंना पत्रे लिहिली. त्यांचे जवळचे मित्र विष्णुपंत देशपांडे, सासने, केशवराव कानिटकर, ज. स. करंदीकर ह्यांना वेळोवेळी ते पत्रे लिहीत होते. नाताळची सुट्टी झाल्यावर त्यांनी आपली धाकटी बहीण मुक्ता, जमखंडीस त्यांचे घरी असलेली वासुदेवराव सुखटणकर यांची आजारी बहीण शांता हिला भेट म्हणून चित्रे पाठविली. आपली आई व पत्नी यांनाही ते पत्रे लिहीत होते आणि नवलाची गोष्ट अशी की, त्यांची वृद्ध आई व नव्यानेच लिहिणे-वाचणे शिकण्याचा प्रयत्न करणारी त्यांची पत्नी रुक्मिणीबाई ह्याही त्यांना पत्रे पाठवीत असत. जनाबाई विस्ताराने घराकडील वार्ता त्याचप्रमाणे स्वतःची मनःस्थिती कळवीत असत. त्यांच्या आईला आपल्या मुलाच्या कर्तृत्वाबद्दल फार अभिमान वाटत होता. तिचे पत्र पुढीप्रमाणे :

जमखंडी,
ता. २६/१/(०२)

चि. विठु बाळा यास अनेक आशीर्वाद,
तुझ्या लहानपणीच्या सर्व गोष्टी आठवतात. तू लहान होतास. तेव्हा एकदा जकनकमतच्या (जगन कामतच्या?) शेतास माझ्याबरोबर आला होतास. तुला (१) पैसा दिला होता. तो तुझ्या हातातून (को) ठेत (री) हरवला. तेव्हा मी तुला शेतापासुन घरी येईपर्यंत फार छळले आणि आता तुझी कीर्ती सर्व जगभर पसरेल. आता तु पुढे माझ्या भारोभार सोनेहि वाटशील. परंतु तेव्हा बोलल्याची आठवण होते; बाळा त्यावेळी (तुझ्या) योग्यतेची मला कल्पना तरी होती काय? आता पत्र पुरे करिते. माझा तुला पूर्ण आशीर्वाद.३
तुझी जननी
सौ. यमुना

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पत्नी सौ. रुक्मिणीबाई यांचे स्वतःच्या हस्ताक्षरातील पत्र पुढीलप्रमाणे :

जमखंडी,
ता. २९/१/१९०२

जीवलग प्राणपती यांचे शेवसी
आता रोज दोन प्रहरच्या वेळी वनसंच्या पुढे वाचन लिहिणे करिते. त्या मला आता काही सोपी सांगितातली गाणी शिकवितात. मलाही थोडी शिकावयाची गोडी लागत चालली आहे. तेरदाळाहुन (बहिणाबाई) आल्या आहेत. त्यांनाहि काही शिकवण्यास वनस जातात. तेव्हा मी ही तेथेच जाईन. मला जोडी बरी झाली.
आपली रुक्मीणी

हेची पत्री ती. विठु आण्णा यांस साष्टांग दंडवत असे.४
आपली बहीन
मुक्ताबाई

वासुदेवराव सुखटणकरांची बहीण ह्या सुमारास विठ्ठल रामजींच्या कुटुंबात राहत होती. आजारपणामुळे तिची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. जनाबाईंनीच अर्धांगवायूच्या आजारपणात शांताची एक प्रकारे जबाबदारी घेतली होती व त्यांनी केलेल्या दक्षतापूर्वक व प्रेमळ शुश्रुषेने शांताच्या प्रकृतीत अल्पशी सुधारणा घडून आली होती. विठ्ठल रामजींनी इतर मुलांना नाताळची भेट म्हणून पाठविली. त्यात शांतालाही चित्राचे भेटकर्ड पाठविले होते. एक लहान मुलगी फुलपाखराला पकडू पाहते असे ते चित्र होते. तिच्या आजाराचे भयंकर स्वरूप, त्यामध्ये झालेली अल्पशी सुधारणा व जनाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिच्या ठिकाणी असणारी बुद्धिमत्ता आणि तरल संवेदनशीलता या सा-या गोष्टी ध्यानात येऊन तिचे पुढील पत्र हृदयद्रावक वाटते.

प्रिय विठू आण्णा,
आज तुम्ही आम्हा मुलांना नाताळची चित्रे पाठविलीत ती ज्याची त्याला अगदी योग्यच होती. पण मला जे दिले ते माझे मला अगदी योग्य आहे. मला योग्य असे शोधून काढणे व ते सापडणे हे काम मोठे कठीण आहे. असे योग्य चित्र शोधून काढण्यास सर्व विलायत पालथी केली असेल. पण मला पाखरू धरण्यापुरती आता शक्ती आली तेव्हा सौ. जनाक्कास आशा होती की आपले चित्र असेल. पण नाही असे समजले तेव्हा निराशा झाली.५
आ. ब. शांता

जनाबाईंची मनःस्थिती वेगळ्याच असाधारण कारणामुळे नाजूक झालेली होती. परित्यक्तेचे जिणे जगणे त्यांना भाग पडले होते. जनाबाईंच्या जिवाला तिच्या सासरी धोका असल्यामुळे तिला पाठवू नये हा विठ्ठल रामजींचाय निर्णय आईवडिलांनाही मानावा लागला होता. पण त्यामुळे जनाबाईंची सर्वतोपरी जबाबदारी विठ्ठल रामजींवर येऊन पडली होती व ती त्यांनी स्वेच्छेने पत्करली होती. तिच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केली होती. तिच्या आध्यात्मिक उन्नतीची काळजी ते वाहत होते व व्यावहारिक शहाणपणाच्या गोष्टी सांगून तिची समज वाढवीत होते. जनाबाईही बुद्धीमान होत्या. साहित्य वाचण्याची त्यांना आवड होती. हरिभाऊ आपटे यांच्या सुधारणावादी कादंब-या दोघांनीही वाचल्या होत्या. म्हणून जनाबाईंच्या पत्रामध्ये स्वतःच्या मनःस्थितीचे तसेच इतरांचे वर्णन मार्मिकपणे येते. जानेवारी १९०२ रोजी जनाबाईंनी प्रिय विठूअण्णांना पत्र लिहिले. विष्णुपंत देशपांडे यांच्या भेटीचा वृत्तान्त या पत्रात निवेदन केला आहे. त्यांनी लिहिले, “बोलता, बोलता पुढे मला तुझी शांती ढळू देऊ नकोस” असे का म्हणाले असतील? अण्णांना माझ्या शांतीविषयी भीती आहे काय? अण्णा मी आजपर्यंत (ह्या पाच-सहा वर्षांत) तुझ्यापुढे किंवा कुणापुढे माझ्या आयुष्यासंबंधी गोष्ट काढून डोळ्यांतून पाणी काढले नव्हते. तुझ्यापुढे कधी काढिले होते का? मला वाटते कधीच नाही... तुझ्याच गोष्टी निघाल्या. पुढे पाच वाजले. सर्व लहानथोर मंडळींनी मिळून भजन केले. मग मला थोडे समाधान वाटले. आण्णा तुला नाही का रे माझ्या शांतीची भीती? तू जाताना एकदा मला उपदेश करशील अशी मला फार आशा होती. ती तुझ्या जाण्याच्या घाईमुळे राहिली. हल्ली मी तुझ्या जागी वासुआण्णालाच तूच असा मानिते बरे. तू येथे नाहीस तरी मी आण्णांच्या परवानगीशिवाय काही कमीजास्ती करणार नाही. वासुआण्णा दूरचा असा मुळीच वाटत नाही. बरे आता रात्र फार झाली. १२ वाजले. उद्या पहाटे मी मळलीस जाणार तर ह्या वेळेस तुझ्याबरोबर बाहेर फिरण्यास येणार नाही. तू वाट पाहशील म्हणूनच कळविले. पुढच्या खेपेस येते तेव्हा होडीत बसून टेम्स नदीत फिरू बरे! अरे आण्णा आधिच कळविले असते तर मी लंडनास आले नसते का? असो. मध्येच मी सांगते तूं मजविषयी कसलीच काळजी करू नकोस. आणि इकडे आईबाबांनाहि थोडे कळव. मी तरी किती म्हणून सांगू? नेहमी आईचें हेंच म्हणणे असते कीं, “माझ्या जनाक्काला पाहिल्याबरोबर मला कसेसेच होते.” असे म्हणून चट्दिशी उठून कोणीकडे तरी करत वेड्यासारखी फिरूं लागते. तेव्हां तिच्या पोटात आगच पडल्याप्रमाणेंच होते. मी कसें तिचे समाधान करूं? तूच कर. तिचें असें करणें पाहून मला तिजपुढे बसवत नाही. आईल असे का होत असेल?”६

पत्राच्या उत्तरार्धात विठ्ठल रामजींच्या साडेचार महिन्याचा मुलगा प्रताप ह्याच्याच अनेकविध बाळलीला मनोरंजकपणे त्यांनी लिहिल्या आहेत. जनाबाईंच्या वाट्याला आलेल्या ह्या दुर्दैवी परिस्थितीबद्दल सगळ्यांनाच कशी चिंता वाटत होती हेही या पत्रावरून जाणवते.

जनुभाऊ करंदीकरांनी मुधोळहून २७ नोव्हेंबर १९०१ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांना इंग्लंडला पहिले पत्र पाठविले ते कमालीचे प्रांजळ आहे. पत्र इंग्रजी भाषेत आणि वळणदार अक्षरात लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे.

“तुमचं पत्र वाचल्याबरोबर मनात पहिली भावना निर्माण झाली ती आनंदाची-आपला एक मित्र इंग्लंडमध्ये गेला आहे ह्या विचारामुळे. दुसरी भावना (ह्या पापी मनाला काय म्हणावे!) होती ती हेव्याची. हेवा अशासाठी की तुम्ही मार्सेय, पॅरिस, लंडन आणिक कितीतरी बघितलं याबद्दल. तिसरा विचार मनात आला की, आता तुम्ही हिंदुस्थानचा आणि जे जे हिंदुस्थानातील आहे त्याचा तिटकारा करायला लागला असाल. आपल्या संस्था, उद्योग आपली बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक क्षमता ही तेथील बौद्धिक, सांपत्तिक आणि शारीरिक क्षमतेच्या बाबतीत तिकडील जायंटसच्या पुढे इकडील सर्व गोष्टी पिग्मी वाटायला लागल्या असतील. कदाचित तुमची कल्पना वेगळी असू शकेल. पण मला मात्र खात्री वाटते की, मी जर युरोपच्या किना-यावर पाय ठेवला तर आपण त्या भूमीत जन्मलो नाही याबाबत मला निश्चित पश्चात्ताप वाटेल. का गोष्टी दुरूनच मोठ्या वाटतात अशी वस्तुस्थिती आहे?

“तुमचा अभ्यासक्रम कसा चालला आहे? प्रगती कशी आहे? माझी अशी कल्पना आहे. तुम्हाला तेथे परकेपणा जाणवत नसेल.

“आपले मित्र सिनियर रँग्लर परांजपे यांना सेंट जेम्स कॉलेजची फेलोशिप मिळण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. ते इंग्लंड सोडण्यापूर्वी तुमची त्यांची भेट होण्याची शक्यता आहे काय?

“शेक्सपियर, बेकन, हॉवर्ड, मार्टिनो, ग्लॅड्स्टन इत्यादिकांची भूमी बघण्याचा कोण आनंद? या बाबतीतील तुमचा स्वार्थीपणा मी क्षम्य मानीत नाही. असे असूनही भारतीय डाक येण्याचा दिवस तुम्हाला अतिशय आनंददायक वाटत नाही काय? आम्ही सर्व क्षेम. तुमचे क्षेम चिंतितो.”७
तुमचा मित्र,
जनार्दन एस्. करंदीकर

जनुभाऊ करंदीकरांना वाटल्याप्रमाणे इंग्लंडबद्दल अतीव गौरवाची आणि भारताबद्दल तिटका-याची भावना विठ्ठल रामजींच्या मनामध्ये मुळीच निर्माण झालेली दिसत नाही. संपूर्ण प्रवासात आणि युरोपमधील वास्तव्यात त्यांच्या ठिकाणी सामान्यतः भारतीय प्रवाशाची त्या काळात दिसून येणारी न्यूनगंडाची भावना यत्किंचितही दिसून येत नाही. रावजी भवानराव पावगी यांना विलायतला जाताना आपल्या बोटीच्या प्रवासात युरोपियन माणसाकडून सेवा करून घेणे जड वाटत होते; कारण साहेब म्हटला की वरिष्ठ समजून त्याला मान देण्याचे मनाला वळण होते असे त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात नमूद केले आहे. विठ्ठल रामजी मात्र बोटीवरील गोरे सेवक आणि काळे सेवक ह्यांच्या मनोवृत्तीतील फरक त्या दोघांना चाकर समजून वर्णन करतात. उपद्रव सोसूनही डोक्यावर रुमाल ठेवणे हा देशीपणाचा आग्रह शिंदे यांनी बिलकूल सोडला नाही. धर्मविषयक आणि संस्कृतीविषय त्यांच्या या बाबतीतील विचारात दुरभिमान किंवा न्यूनगंड अगदी सोडला नाही. त्यांची भूमिका सदैव निरामय, सत्यनिष्ठेचीच असल्याचे दिसते.

विठ्ठल राजमी शिंदे यांनी स्कॉटलंडमधील लॉखलोमंड हे सरोवर बघून तेथून लिहिलेल्या पत्राला जनुभाऊ करंदीकरांनी १० सप्टेंबर १९०२ रोजी उत्तर लिहिले आहे. त्यामध्ये प्रारंभी एक सखोल विचार प्रकट होत असला तरी एकंदरीत त्यांची व्यावहारिक दृष्टीच त्यामधून विशेषत्वाने प्रकट होताना दिसते. इंग्रजीत लिहिलेल्या ह्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, “तुमचे लॉखलोमंडवरून पाठविलेले पत्र वाचून अतिशय आनंद वाटला. तुमचे पत्र केवळ काव्यमय कल्पनांनी भरलेले आहे. दुस-या शब्दांत मी त्याचे वर्णनच करू शकत नाही. तुमचा सध्याचा मूड पाहून माझी खात्री झाली आहे की, उच्च धार्मिक विचार आणि कवीची उत्कट कल्पनाशीलता ह्या दोहोंमध्ये अपरिहार्य असे नाते असते आणि मला असेही वाटते की, कवी कधी नास्तिक असू शकत नाही.

“असो. तुमची सुटी पावन अशा सरोवर प्रांती घालवीत आहात याचा मला फार आनंद वाटतो. तुम्ही आपले पत्र व्यावहारिक पातळीनरून लिहून आतापर्यंतची अभ्यासक्रमातील प्रगती व पुढील वर्षांतील अभिप्रेत अभ्यासक्रम याबद्दलची माहिती कळविली असती तर मला तुमचे पत्र अधिकच आवडले असते.

“तुम्हाला अभ्यासक्रम सोपा वाटतो का? उदात्त वाटतो का? तुम्ही निवडलेल्या अभ्यासक्रमाने तुमच्या मनाला पूर्ण शांती मिळाली आहे का? हे आणि अशाच प्रकारचे प्रश्न मला आणि तुमच्या आईवडिलांना, मित्रांना सतावीत आहेत. ह्याचे निर्णायक होकारार्थी उत्तरच माझ्या मनाचे समाधान करू शकेल. तुमच्या सुखदायक अशा सुट्टीतील प्रवासाच्या वृत्तान्ताने समाधान होणार नाही. कारण मी व्यवहारी मनुष्य आहे आणि तुमचे नातेवाईक आणि मित्रही तसेच आहेत. तुम्ही अभ्यासक्रमासंबंधी यत्किंचितही लिहिले नाही.

“मी कायद्याच्या परीक्षेचा अभ्यास अद्याप पूर्ण केला नाही व चालू वर्षी परीक्षेला बसण्याचा माझा विचार नाही.

“१८९४ मध्ये इंटरमीजिएटच्या वर्गात असताना अर्नोल्डच्या वेच्यांतील सोहराब आणि रुस्तुम वाचीत असताना कुणाला स्वप्नात तरी वाटले होते का की, आठएक वर्षांनंतर मूळ हस्तलिखित पाहण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल? अथवा त्याही मागे, १८९० मध्ये इंग्रजी सहावीत असताना ‘लेडी ऑफ द लेक’ हे काव्य वाचीत असताना कुणाला वाटले तरी होते का की, तुम्ही प्रत्यक्ष लॉख कॅट्रेन बघणार आहात? ज्याची कल्पनाही केलेली नसते अशा गोष्टी काळाच्या करामतीने घडतात !

“तुम्हांला नियमितपणे स्कॉलरशिप मिळत असेल व तुमची कोणतीही गैरसोय होत नसेल अशी आशा आहे.

“स्वीकृत कार्यात तुम्हाला यश मिळो ही अंतःकरणपूर्वक इच्छा प्रकट करून हे पत्र संपवितो.”८
तुमचा मित्र,
जनार्दन सखाराम करंदीकर

जनुभाऊ करंदीकरांच्या ह्या पत्रांवरून ह्या दोन मित्रांत कसे होते आणि दोघांच्या वृत्तीमध्ये विरोधही कसा होता याची कल्पना येते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचे दुसरे मित्र केशव रामचंद्र कानिटकर यांनी त्यांना पत्र लिहून मुख्यतः फर्ग्युसन कॉलेजात रँग्लर परांजपे प्रिन्सिपॉल म्हणून आले ही गोष्ट व गॅदरिंगमध्ये ‘त्राटिका’ हे नाटक बसविले, या संबंधीची साद्यंत हकिकत पत्राद्वारे कळविली. सांस्कृतिकदृष्ट्याही कानिटकरांचे हे पत्र महत्त्वाचे आहे.९

मंबई
कुलाबा ऑब्झरव्हेटरी
२४/२/०२

सा. न. वि. वि.
फार दिवसात पत्रव्यवहार झाला नाही. आपण गेल्यावर मला पत्र पाठविले ते पोहोचले. पण त्यावर विशेष लिहिण्यासारखे नसल्याकारणाने इतके दिवस पत्र लिहिले नाही. आपले पत्र १०/१२ दिवसापूर्वी आले असे कळले. पण पत्र मिळाले नाही. चि. सौ. जनाबाई वगैरे यांच्या प्रकृती ठीक आहेत. यानंतर आपल्या कॉलेजची थोडी हकिकत लिहावी म्हणून हे पत्र हाती घेतले आहे. येथे रा. परांजपे आले. त्यांचा योग्य सन्मान झाला व रा. गोळे हे रजेवर असलेमुळे त्यांना अकटींग प्रिन्सिपॉल नेमिले. ते येथे ५/७ वर्षांपूर्वी जसे होते तसेच आहेत. त्यामुळे काहींना बरे वाटत आहे व काहींना वाईट वाटत आहे. यंदा प्लेग सुरू होता तरी कॉलेज जानेवारी ते एप्रिल अव्याहत चालले होते. रा. परांजपे यांनी कॉलेजात व्यवस्थिपणा आणण्याचा बराच प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे फल कसे काय येते ते पाहावयाचे आहे. यंदा कॉलेजमध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅदरिंग ही होय. त्याची सर्व व्यवस्था माझेकडेच होती. मागील जुने विद्यार्थ्यांना निमंत्रणपत्रिका पाठविल्या होत्या व विशेष जे आम्ही यंदा केले ते ‘त्राटिका’ नाटक बसविले हे होय. ‘त्राटिका’ नाटक म्हटल्याबरोबर आपणास कदाचित चांगले व वाईट एकदम वाटेल. आम्ही ‘स्टेज’ रेसिडन्सी चौकात तयार केले होते. त्याची लांबी रुंदी स्टेजपेक्षाही मोठी होती. या नाटकातील मंडळींत गावांतील विशेष हा होता की, एक-दोन स्त्रीपात्रे शिवाय करून सर्वजण Senior बी. ए. क्लासमधील विद्यार्थी होते. त्यामुळे नाटकातील सर्व खुब्या व रहस्य समजण्यास फारशी अडचण पडली नाही. नाटक बसविण्यात प्रो. भानू यांनी फार मेहनत घेतली. एक-दोन रंगीत तालमी झाल्यानंतर ता. २७ मार्च रोजी तयार केलेल्या रंगभूमीवर प्रयोग केला. त्या वेळेला प्रेक्षकसमूह सुमारे १००० होता. कारण गावातील मंडळींनाही आम्ही पासेस दिले होते. खेळ चांगलाच झाला व म्हणून आम्ही तो गावात करून दाखवावा अशा सूचना आल्या. होय-नाही म्हणता म्हणता करावयाचे ठरले. त्या वेळे मी धोमास गेलो होतो त्याचे कारण चि. बाबा-माझा धाकटा भाऊ - याचे लग्न होते. आपणास ठाऊक असेलच की त्याचे पहिले बायकोचे डोळे फार बिघडले व ती आता अगदी आंधळी झाली आहे. तेव्हा याचे दुसरे लग्न केले आहे. मुलगी १२/१३ची आहे वयाने. असो. याप्रमाणे कळल्यावर मी पुन्हा पुण्यास आलो व ता. १० एप्रिल रोजी तो प्रयोग करून आम्ही दाखविला. तो प्रयोग चांगलाच वठला. याबद्दल मते केसरी व सुधारक या पत्रामध्ये आली आहेत. त्याचे कपटे आपणाकडे सोबत पाठविले आहेत. त्या दिवशी आम्हाला ४०० रुपये उत्पन्न झाले. खर्च जाऊन बाकी कॉलेज जिमखान्याला द्यावयाची आहे. प्रो. गोखलेही त्या वेळेस हजर होते. त्यांना तर फारच आनंद झाला. प्रो. राजवाडे, पानसे हे तर अगदी खूष झाले. चौथा अंक संपल्याबरोबर गावातील एका गृहस्थानी आम्ही पुन्हा एक वेळ खेळ करावा असे सुचविले. पण ‘लोकाग्रहास्तव’ खेळ करण्याचे नादी न लागता आम्ही सर्वजण आपापले अभ्यासास लागलो आहोत. प्रो. गोखले यांनी तर सांगितले की, ‘प्रतापराव त्राटिका’ ही शाहू नगरवासी ना. मं. च्या इतकी वठली नाहीत खरी, तरी पण एकंदरीत खेळ त्याचेवर ताण झाला. कितीएक विद्यार्थी तर उद्गारले की या समयाला प्रो. केळकर हयात पाहिजे होते. प्रो. गोखल्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही एक हजार रुपये जमवावे व जिमखान्याचा फंड तयार करावा. जून-जुलैमध्ये ते आम्हाला खेळ करावयाला लावतील की काय अशी भीती वाटत आहे. तरी पण सर्व मंडळींनी असा निश्चिय केला आहे की डिसेंबरशिवाय काही करावयाचे नाही. या महिन्यात मात्र मुंबई, पुणे व कोल्हापूर या गावी जावयाचे. या नाटकात मीही पार्ट केला तो कोणता म्हणशील तर... संभाजीचा खोटा बाप. यावरून (त्यावरच्या सर्व हकिगतीवरून) तुला कळेल किती आम्ही खाली जात चाललो आहो? सर्व धंदे सोडून देऊन नाटके करीत आहोत. (?) आसो.

सध्या मी मुंबईत कुलाबा Observatoryत यंत्र पाहण्याकरिता ५/६ दिवस आलो आहे. गेले रविवारी आलो. बहुतेक काम झाले आहे. १/२ दिवसांनी पुन्हा पुण्यास परत जाईन तेव्हा माझा पत्ता कॉलेजचाच आहे.
केशव कानिटकर

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ९०.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘जलप्रवास’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १.
३.    वि. रा. शिंदे यांचा पत्रसंग्रह.
४.    तत्रैव.
५.    तत्रैव.
६.    तत्रैव.
७.    तत्रैव.
८.    तत्रैव.
९.    तत्रैव.

  1. निवेदन
  2. निधीची योजना
  3. धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन
  4. धर्मप्रचारार्थ दौरा
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121
  • 122
  • 123
  • 124
Page 120 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी