1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

निवेदन

विसाव्या शतकातील श्रेष्ठ धर्मचिंतक व समाजसुधारक महर्षी वि. रा. शिंदे यांचे जीवनचरित्र वाचकांना अर्पण करताना विशेष आनंद होत आहे. मराठीतील प्रगतिशील विचाराचे लेखक गो. मा. पवार यांनी 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'तर्फे मिळालेल्या अभ्यासवृत्तीतून महर्षी शिंदे यांच्या जीवन व कार्याचा सखोल अभ्यास केला व त्यातून हे चरित्र सिद्ध झाले आहे.

महर्षी शिंदे यांचे अस्पृश्योद्धाराच्या क्षेत्रातील कार्य व त्यांनी मांडलेला धर्मविचार अजोड आहे; मात्र महाराष्ट्राने आजवर त्यांच्या या योगदानाची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही, अशी खंत गेली अनेक वर्षे काही संवेदनशील समाजचिंतक व्यक्त करत आहेत. 'लोकवाङ्मय गृहा'ने मात्र प्रथमपासूनच महर्षी शिंद्यांविषयीची 'विठ्ठल रामजी शिंदे : शापित महात्मा', 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांचे आर्थिक आणि सांस्कृतिक विचार', 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी', 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांचे बहुजनवादी राजकारण' आणि 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार' ही आमची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज महर्षी शिंद्यांचे हे विस्तृत व प्रदीर्घ असे जीवनचरित्र प्रकाशित करताना त्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाल्याचे समाधान आम्हाला आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या निर्मितिखर्चाचा वाटा काही प्रमाणात उचलण्याचे मौलिक कार्य 'समाजसुधारक आगरकर विचार व्यासपीठा'ने केले आहे. त्यांच्या या सहकार्यामुळेच गंभीर ग्रंथांविषयी मोठ्या प्रमाणावर अनास्थेचे वातावरण असण्याच्या सध्याच्या काळात आकाराने एवढा मोठा ग्रंथ प्रकाशित करण्याचे धाडस आम्ही करू शकलो व ग्रंथाची किंमतही तुलनेने कमी ठेवणे शक्य झाले. 'आगरकर व्यासपीठा'चे आम्ही आभारी आहोत.

एवढ्या प्रदीर्घ ग्रंथांची सूची वेळेत पूर्ण करण्याचे क्लिष्ट काम प्रा. शैलेश औटी यांनी केले. तसेच सुबक असे मुखपृष्ठ श्री. बाळ ठाकूर यांनी करून दिले. याबद्दल त्यांचेही आभार.

- प्रकाशक

निधीची योजना

मिशनच्या वाढत्या कामाला सदैव पैशाची चणचण भासत असे. दयारामजी गिडुमल ह्यांनी मिशनला दरमहा १००/-रु. ची जी देणगी दिली होती ती ३ वर्षांसाठी होती. १९१०च्या जून अखेर ही वर्गणी बंद व्हावयाची होती. म्हणजे मिशनचे काम तर वाढले परंतु पैसा मात्र नाही, अशी पाळी मिशनवर आली होती. ह्या परिस्थितीचे विनोदात्म वर्णन शिंदे ह्यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, “गरिबांची लग्ने करण्यात लोक मोठा परोपकार समजतात; पण लग्नामुळे संसाराच पसारा होऊन गरिबांचे फार हाल होतात. तसाच ह्या मिशनचा प्रकार झाला.”१

निराश्रित सेवासदन मदतीच्या अभावी बंद करून कार्यकर्त्यांची इतर कामांकडे त्यांना वाटणी करावी लागली. सय्यद अब्दुल कादर आणि इतर कार्यकर्ते ह्यांचे वेतन बंद करणे शक्य नव्हते. मात्र पनवेलची नोकरी सोडून आलेल्या जनाबाईंचे अल्पवेतन मात्र त्यांना थांबवावे लागले. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क ह्यांच्या कन्येने जलसा केल्यामुले जी मदत मिळाली होती तीत भर घालून ५ हजार रुपयांची रक्कम मुंबईतील ट्रस्टीकडे कायम निधी म्हणून ठेवण्यात आली. तिचा चालू खर्चासाठी उपयोग नव्हता. त्यामुले रुपी फंड, तांदूळ फंड, कपडे फंड, पेटी फंड अशा युक्त्या-प्रयुक्त्या शिंदे ह्यांनी योजिल्या. त्यामुळे मिशनच्या कामाचा प्रचार होऊन खर्चाची तोंडमिळवणी करणे संस्थेला काहीसे शक्य झाले.

१८ ऑक्टोबर १९०९ रोजी मिशनच्या संस्थापनेचा दिवस साजरी करण्यासाठी आणि शाळांतील मुलाचा बक्षीस समारंभ करण्याकरित मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये टोलेजंग जाहीर सभा भरविण्यात आली. तिचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराज गायकवाड ह्यांनी सुशोभित केले. मिशनचे अध्यक्ष नामदार चंदावरकर, नामदार गोपळ कृष्ण गोखले, मि. विमा दलाल, बडोद्याचे पंडित आत्माराम ह्यांची भाषणे झाली. गावातील प्रमुख स्त्री-पुरुषांनी प्रशस्त टाऊन हॉल गच्च भरला होता. श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी दोन हजार रुपयाची रक्कम शिष्यवृत्ती देण्यासाठी जाहीर केली. मिशनचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला ह्यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली. ह्या मोठ्या रकमा कायम निधीकडेच वळविण्यात येणार असल्यामुळे दैनंदिन खर्चाची चिंता तशीच राहिली.

मिशनला आर्थिक साहाय्य व्हावे ह्या हेतूने सौ. लक्ष्मीबाई रानडे व इतर दोन-तीन सहकारी स्त्रियांनी ह्या प्रसंगी एक वेगलीच युक्ती अवलंबिली. टाऊन हॉलचे पुढचे तीन दरवाजे त्यांनी रोखले व एकेका दरवाजात दोघीदोघी भगिनी आपली शाल पसरून त्या प्रचंड समुदायातील बाहेर जाणा-या प्रत्येकास काहीतरी देणगी टाकण्याचा आग्रह करू लागल्या. सारा जमाव जणू काय कैद झाल्यासारखा देखावा दिसू लागला. पण कोणीही तक्रार न करता उलट ह्या स्त्रियांचे कौतुक करून श्रोतेमंडळी आपखुशीने शालीत देणग्या टाकू लागली. ह्म कैदेत मुंबईचे पोलीस कमिशनर सापडले. खिसे चाचपल्यानंतर खिशात काही न सापडल्यामुळे कमिशनरसाहेब गयावया करू लागले. लक्ष्मीबाईंनी एक शिसपेन्सिल आणि कागदाचा तुकडा त्यांच्या हाती देऊन “झोळीत आकडा टाका म्हणजे सुटका होईल, एरव्ही नाही.” असे सांगितले. कमिशनरसाहेबांनी दुस-या दिवशी देणगीची रोकड शिंदे ह्यांच्याकडे पाठविली. “ही माझी खंडणी घेऊन माझी मुक्तता करा.” अशी त्यांनी विनंती केली होती. देणगीचा आकडा अशा प्रकारे बराच मोठा झाला होता.
मिशनच्या कामाचा बराच बोलबाला झाला होता. त्यामुळे अनपेक्षितपणे कधी कधी देणगी मिळत असे. हिंदुस्थानचे व्हाईसरॉय हार्डिंज व त्यांची पत्नी लेडी हार्डींज ह्यांच्या कानी मिशनचे काम गेले. म्हणून न मागता लेडी हार्डिंज ह्यांनी मोठ्या उदारपणे रोख दोन हजार रुपये पाठवले. मिशनच्या कामाचा चांगलाच बोलबाला झाला होता व मिशनने चालविलेल्या कामाचे महत्त्व समाजातील सगळ्या थराला जाणवू लागले होते. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या इंग्रजी अधिका-यांनाही जाणवू लागले होते.

अस्पृश्यतानिवारणाचे कार्यक्षेत्र वाढवावे, ह्या कार्याची महती लोकांनी पटकून द्यावी, शक्य असेल तिथे मिशनच्या शाखा नव्याने सुरू कराव्यात वा मिशनच्या कार्यामध्ये सामील करून घ्याव्यात, त्याचप्रमाणे मिशनच्य ह्या वाढणा-या कामासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करावा ह्या हेतूने विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी विस्तृत दौ-याची योजना आखली.
१९११च्या एप्रिलच्या ९ तारखेपासून त्यांनी व-हाड, काठेवाड, कर्नाटक आणि कोकणातील पश्चिम किनारा ह्या भागाचा दौरा सुरू केला. दौ-यामध्ये व्याख्यानाच्या द्वारा अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याचे महत्त्व पटवून देणे; ह्या कामाबद्दल सहानुभूती असणा-या गावांतील प्रतिष्ठित वजनदार मंडलींना सहभागी करून सभा घेणे; ह्या कामासाठी स्थानिक वजनदार पुढा-यांची कमिटी नेमणे; अस्पृश्यवर्गीयांच्या वस्तीची पाहणी करून तेथील लोकांशी संपर्क स्थापन करणे; डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे ज कार्य चालले आहे त्या कामाची माहिती सांगून त्याचे महत्त्व पटवून देऊन मिशनसाठी निधी गोळा करणे ही अण्णासाहेब शिंदे ह्यांनी दौ-याची उद्दिष्टे व कार्यपद्धती ठेवली होती.

शिंदे ह्यांनी ९ एप्रिल रोजी अकोल्यापासून दौ-याला प्रारंभ केला. अकोला, अमरावती, थगाव येथे सुमारे दोन आठवड्यांचा त्यांनी दौरा केला. अकोल्यातील थिएटरात व्याख्यान दिले. जानोजी डिप्रेस्ड क्लास बोर्डिंगमध्ये उपासना चालविली. महारवाड्यातील रात्रीच्या शाळेत अस्पृश्य स्त्रियांकरिता व्याख्यान दिले व महारवाड्यात कीर्तन केले. अकोला येथील जानोजी फ्री बोर्डींग हे मिशनच्या वतीने चालविले जात होते. स्थानिक कमिटीच्या सदस्यांच्या गाठी घेऊन कामाविषयी त्यांनी चर्चा केली व बोर्डींगची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढेल ह्यासंबंधी विचारविनिमय केला. अमरावतीला एक दिवस राहून थुगाव येथे गेले. चार दिवस तेथे राहिले. अण्णासाहेबांच्या प्रेरणेने गणेश आकाजी गवई ह्यांनी तेथे प्रार्थनासमाज स्थापन केला होता. अण्णासाहेबांच्या तेथील मुक्कामात अस्पृश्यांची मोठी परिषद भरली. ह्या परिषदेत आजूबाजूच्या ८० खेड्यांतून सुमारे चार हजार लोकांचा समुदाय लोटला होता. ही परिषद दोन दिवस चालली. थुगाव येथील प्रार्थनासमाजात अण्णासाहेब शिंदे ह्यांनी उपासना चालविली. तेथील भजनसमाज उत्तम प्रकारे काम करतो हे त्यांच्या ध्यानात आले. समाजातील सुमारे २० महार सदस्यांची सामाजिक व धार्मिकबाबतीत प्रागतिक स्वरूपाची मते असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. ह्यामुळे मुंबई शाखेने येथील भजनसमाजाकडे अधिक लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी ध्यानात घेतले. थुगाव येथील कामगिरी आटोपून ते अमरावतीस परत गेले.

अमरावती येथील कार्याला प्रारंभ विठ्ठल रामजी शिंदे प्रेरणेनेच झाला होता. १९११ साली प्रसिद्ध झालेल्या मिशनच्या १९०८ ते १९१०च्या त्रैवार्षिक अहवालात अमरावती शाखेचा अहवाल समाविष्ट केला आहे. त्यामध्ये श्री. जी. एन्. काणे व श्री. एन्. एस्. भांगले ह्या सेक्रेटरींनी अमरावती शाखेचा पूर्वेतिहास देताना म्हटले आहे, “मे १९०७ मध्ये ज्या वेळेला डी. सी. मिशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी हे अमरावतीला भेट देण्यासाठी आले होते व त्यांनी अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या उन्नतीसंबंधी नगरवाचनालयात डिस्ट्रिक्ट जज्ज मि. प्रिदॉ (Pridaux) ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले, त्या वेळेला त्या शहरामध्ये अस्पृश्यवर्गीयांचा प्रश्न पहिल्यांदा चर्चिला गेला.”२ ह्या भेटीमध्ये रावबहादून आर. एन्. मुधोळकर व मिशनचे स्थानिक सेक्रेटरी जी. एन. काणे ह्यांनी मिशनशी सहकार्य करण्याचे वचन दिल्यामुळे ह्या भागात पुन्हा एकदा मुद्दाम भेट द्यावी असे त्यांच्याच विचाराने ठरविले. स्थानिक मंडळींच्या मोठ्या उत्साहामुळे व-हाडातील डी. सी. एम्. शाखांची ही प्रमुख मध्यवर्ती शाखा होण्यास योग्य आहे असे त्यांना वाटले. हा दौरा आटोपून मुंबईस ते २३ एप्रिलला परत आले.

विठ्ठल रामजी शिंदे मुंबईस आल्यानंतर त्याच दिवसी म्हणजे २३ एप्रिल रोजी काठेवाडच्या दौ-यावर निघाले. ह्या दौ-यात ते राजकोट, गोंडल, भावनगर, मांगरोल, जुनागड, वादिया ह्या ठिकाणी गेले व पुन्हा राजकोटला येऊन मुंबईस १८मे रोजी परतले. राजकोट येथील राजे ठाकोरसाहेब ह्यांची धेड लोकांच्या सुधारणेबद्दल सहानुभूती होती व त्यांच्या प्रेरणेने ह्या लोकांसाठी तेथे एक शाळा चालली होती. ठाकोरसाहेबांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब शिंदे ह्यांचे कॅनॉट हॉलमध्ये व्याख्यान झाले. राजकोट येथील स्थानिक कमिटी मिशनशी संलग्न नसतानाही तिच्या सभासदांनी शिंदे ह्यांच्याशी सर्वतोपरी सहकार्य करून मिशनसाठी २९९ रुपयांची रक्कम जमा केली. ह्यापैकी अर्धी रक्कम शिंदे ह्यांनी कमिटीच्या स्थानिक उपयोगासाठी परत केली. दोन दिवस राजकोटला राहिल्यानंतर शिंदे गोंडल येथे गेले. तेथील दिवाणांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कॉलेजमध्ये त्यांनी एक व्याख्यान दिले. गोंडलचे ठाकोरसाहेब सर भगवंतसिंगजी व त्यांचे चिरंजीव यांच्याशी मुलाखत झाली. श्रीमंत ठाकोरसाहेब इंग्लंडला जाण्याच्या गडबडीत असल्यामुळे विशेष काम होऊ शकले नाही. गोंडल येथून शिंदे भावनगर येथे गेले. दिवाणसाहेब प्रभाशंकर पट्टणी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सामळदास कॉलेजमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. धेड लोकांच्या तेथील वस्तीचे त्यांनी निरीक्षण केले. भावनगर येथील पाच दिवसांच्या वास्तव्याचे फलित म्हणून शिंदे ह्यांना तेथे मिशनची स्थानिक कमिटी स्थापन करता आली. डॉ. देव ह्यांना अध्यक्ष व एल्. बी. वैद्य ह्यांना सेक्रेटरी नेमण्यात आले. ह्या कमिटीने एका शाळा स्थापना करण्याचा निर्णय घेऊन पुढे त्याप्रमाणे शाला स्थापनही केली. दिवाण प्रभाशंकर पट्टणी ह्यांनी शिंदे ह्यांना अरंभिलेल्या कार्याबद्दल आर्थि साहनुभूती दाखविली व त्यांचा संस्थांच्या वतीने उचित गौरव केला. येथे मिशनसाठी रु. ४०५/- एवढा फंड जमला.

मांगरोल हे मुसलमानी संस्थान होते. तेथे चीफसाहेब हिज हायनेस शेखसाहेब व दिवाण बॅ. अलिमहंमद देहवली ह्या दोघांनीही मिशनच्या कार्याला योग्य ते साहाय्य देण्याचे अभिवचन दिले. तेथील मुक्कामात चीफसाहेब त्याचप्रमाणे पोलिटिकल एजंट मि. ई. मॅकनॉच ह्यांच्य भेटी घेतल्या. तेथील धेड लोकांची वस्ती पाहिली. डॉ. रविशंकर अंजारी ह्यांना सन्मान्य सेक्रेटरी करून एक नवीन कमिटी स्थापन केली व ह्या कमिटीच्या वतीने एक दिवसाची शाळा उघडली.

जुनागड येथे अण्णासाहेब शिंदे ह्यांनी १२ व १३ मे असे दोन दिवस वास्तव्य केले. जुनागडचे अँडमिनिस्ट्रेटर मि. रेंडॉल ह्यांची शिंदे ह्यांनी भेट घेऊन त्यांची सहानुभूती संपादन केली. तेथील स्थानिक हायस्कुलात जुनागडचे शिक्षणाधिकारी मि. तर्खड ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले. तेथे स्थानिक कमिटीची स्थापना करून तर्खड ह्यांना अध्यक्ष व मि. पी. नानावटी ह्यांना सेक्रेटरी करून अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली. मि. रेंडॉल ह्यांनी व्यक्तिशः आर्थिक मदत तर केलीच पण त्याशिवाय अस्पृश्यांच्या शाळेचा सगळा खर्च संस्थानाकडून चालविण्याचे वचन दिले. जुनागड येथे मिशनसाठी साडेतीनशे रुपयांचा निधी जमला. शिंदे यांनी वादिया येथे १४ मे रोजी तेथील चीफसाहेबांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शाळेत जाहीर व्याख्यान दिले. तेथून ते राजकोटला परत आले. लिमडीच्या महाराजांकडून २५०/- रुपये व पोरबंदरच्या अँडमिनिस्ट्रेटरकडून निधीसाठी १००/- रुपयांची देणगी मिळाली. व-हाडच्या दौ-यामध्ये अण्णासाहेब शिंदे ह्यांना २७५/- रुपयांचा निधी मिळाला होता तर काठेवाडच्या दौ-यात रु. १४२९/- एवढा निधी जमला. कामाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने शिंदे ह्यांचा काठेवाडीतील हा दौरा यशस्वी झाला असे आढळून येते.

ह्यानंतर अण्णासाहेब शिंदे १२ ऑगस्ट रोजी कर्नाटक प्रांतातील व पश्चिम
किना-यावरील दौ-यावर निघाले. सतत साडेतीन महिने ते त्या दौ-यावर होते. १२ ऑगस्ट रोजी ते पुण्यास गेले. पुणे येथे मिशनची अंगभूत शाखा उत्तम प्रकारे काम करीत होतीच. मिशनच्या शाळेची त्यांनी पाहणी केली. सुतारकामाच्या वर्गामध्ये पुष्कळशी सुधारणा घडत असून ही शाखा उत्तम प्रकारे काम करीत राहील असा विश्वास त्यांच्या मनात उभा राहिला. फर्ग्युसन कॉलेजचे प्रो. लिमये ह्यांच्या अध्यक्षतेखाली जॉन स्मॉल हॉलमध्ये त्यांनी जाहीर व्याख्यान दिले. त्यांचे फर्ग्युसन कॉलेजमधील एक बालमित्र प्रो. के. रा. कानिटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली फर्ग्युसन कॉलेजात व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांसमवेत रुपी फंडासंबंधी चर्चा केली.

१५ ऑगस्ट रोजी साता-यास येऊन तेथे त्यांनी सात दिवस मुक्काम केला. डिस्ट्रिक्ट जज्जांच्या अध्यक्षतेखाली ऑर्थर हॉलमध्ये जाहीर व्याख्यान दिल. सातारा येथील एक प्रार्थनासमाज सर्वस्वी अस्पृश्यवर्गाच्या वतीने चालविण्यात येत असे. त्या समाजामध्ये अण्णासाहेब शिंदे ह्यांनी उपासना चालविली. रावबहादूर व्ही. एन्. पाठक ह्यांच्या घरी वरिष्ठवर्गाच्या स्त्रियांची बैठक बोलाविली. रा. ब. रा. रा. काळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील स्थानिक कमिटीची पुनर्घटना केली. मिशनच्या फंडासाठी तेथे ५९४/- रुपये एवढी रक्कम जमली. सातारा येथे शिंदे ह्यांना एक विशेष गोष्ट दिसून आली. तेथील स्थानिक भजनसमाजाचे महार मांग लोकांशी उघडपणे रोटी व्यवहार करीत होते. असा प्रकार इतरत्र कोठेही आढळून येत नव्हता. महार सदस्यांना मिशनच्या कामाबद्दल सहानुभूतीपूर्वक आदर होता.

साता-याहून विठ्ठल रामजी शिंदे सांगली, मिरज, बुधगाव अशा संस्थानाच्या गावी गेले. सांगली येथील राजेसाहेबांची त्यांनी भेट घेतली. हायस्कूलमध्ये व्याख्यान दिले व तेथील महारवाडा पाहिला. सांगलीला मिळालेल्या निधीची रक्कम रु. १० एवढी होती. मिरजेला चीफसाहेबांशी मुलाखत झाली. बुधगावला २४ ऑगस्टला चीफसाहेबांशी मुलाखत झाली. तेथील अस्पृश्यांची शाळा त्यांनी पाहिली. मिरज आणि बुधगाव येथे मिशनला निधी मिळाल्याचा उल्लेख मात्र आढळत नाही.

२७ ऑगस्ट रोजी शिंदे बेळगावास परतले व पाच दिवस तेथे वास्तव्य केले. तेथे कलेक्टरांची मिशनच्या कामाबद्दल सहानुभूती होती. शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. म्युनिसिपल ऑफिसमध्ये एक व्याख्यान झाले. तसेच महारवाड्यातही व्याख्यान झाले. तेथे स्थानिक कमिटी स्थापन करून गोविंद रामचंद्र ओक ह्यांना सेक्रेटरी नेमले. मिशनला २१०/- रुपये एवढा निधी मिळाला.

शिंदे हे बेळगावहून धारवाडला गेले व १ ते ५ सप्टेंबर असे पाच दिवस धारवडमध्ये राहिले. मि. रोद्द यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सोशल व्याख्यान दिले. अस्पृश्यवर्गाच्या दोन शाळा तपासल्या. मुलींच्या शाळेत अस्पृश्यतानिवारण्याच्या बाबतीत वरिष्ठवर्गीय स्त्रियांशी चर्चा केली. पुरुषांच्या व स्त्रियांच्या ट्रेनिंग कॉलेजास भेट देऊन तेथील प्रिन्सिपॉल व लेडी सुपरिटेंडेंट ह्यांच्याशी अस्पृश्य समाजाबाबत चर्चा केली. तसेच शिंदे धेडवाड्यात गेले व तेथील अस्पृश्यांबरोबर त्यांची स्थिती, त्यांच्या अडचणी व त्या निवारण्यासंबंधी करावयाचे उपाय ह्याबद्दल चर्चा केली. मि. रोद्द हे सामाजिक सुधारणांबाबत प्रयत्न करणारे धारवाडमधील वजनदार गृहस्थ होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली तेथे एक नवी कमिटी स्थापन करून श्री. एन्. आर. देशपांडे वकील यांना सेक्रेटरी नेमले. धारवाड येथील अस्पृश्यवर्गाच्या शाळेत मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आढळली. पण बहुतेक मुली यलम्मादेवीच्या जोगतिणी होत्या. ही बाब शिंदे ह्यांनी डॉ. मॅन ह्यांना कळविली. मुरळी सोडण्याच्या प्रथेविरुद्ध काम करणा-या बालसंरक्षण मंडळींचे डॉ. मॅन हे अध्यक्ष होते.

Read more: निधीची योजना

धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन

विठ्ठल रामजी शिंदे १८९८ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८९९ व १९०० अशी दोन वर्षे सेकंड एल्. एल्. बी. च्या टर्म्स भरण्यासाठी मुंबई जाऊन राहिले. या काळामध्ये मुंबईत प्रार्थनासमाजाच्या शेजारच्या रामजी पुरूषोत्तमच्या चाळीत तिस-या मजल्यावर ते राहत होते. त्यांचे बालपणापासूनचे मित्र जनुभाऊ करंदीकर हेही मुंबईस विठ्ठलरावांप्रमाणेच एल्. एल्. बी. च्या टर्म्स भरण्याच्या हेतूने मुंबईस आले होते व ते दोघेही एकत्रच राहत होते.१ ह्या काळामध्ये विठ्ठलरावांना एल्. एल्. बी. साठी करावयाच्या अभ्यासाच्या उत्साह असल्याचे दिसत नाही. त्याउलट प्रार्थनासमाजाकडे मात्र त्यांचा ओढा प्रबळ झालेला दिसतो. ते दर रविवारी मुंबई प्रार्थनासमाजात जाऊ लागले. तेथे नव्यानेच सुबोधपत्रिकेचे संपादक झालेले द्वारकानाथ गोविंद वैद्य, विल्सन हायस्कूलमधील शिक्षक वामन सदाशिव सोहोनी आणि मुंबई प्रार्थनासमाजाचे जुने कार्यकर्ते श्री. बाबण बापू कोरगावकर ह्यांचा परिचय झाला. ह्यांपैकी वैद्य व सोहोनी हे तरूण होते, तर कोरगावकरांच्या घरी विठ्ठलरावांचे विशेष जाणे-येणे होते. विठ्ठलरावांचा प्रार्थनासमाजाकडे असणारा ओढा, त्यांची धर्मविषयक तळमळ व त्यांची क्षमता ध्यानात घेऊन उपासना चालविण्यासाठी पुणे प्रार्थनासमाजाने त्यांना प्रथम बोलावले. पुण्याच्या व्यासपीठावरून त्यांनी प्रथम उपासना चालवली त्या वेळी उपदेशाकरिता, ‘धाई अंतरिच्या सुखे | काय बडबड  वाचा मुखे|’ हा तुकारामाचा अभंग घेतला. डॉ. भांडारकर, रा. ब. का. बा. मराठे, केशवराव गोडबोले, शिवरामपंत गोखले इत्यादी वडील मंडळी उपासनेस उपस्थित होती. उपासना चालविण्याचा विठ्ठलरावांचा हा पहिलाच प्रसंग असला तरी उपदेश फारच चांगला वठला. डॉ. भांडारकरांनी जवळ जाऊन त्यांची पाठ थोपटली व प्रेमपूर्वक अभिनंदन केले. शिंदे हे उपासना उत्तम चालवितात व पुण्याची उपासना चालविल्यानंतर डॉ. भांडारकरांनी त्यांचे कौतुक केले, ही वार्ता मुंबईस समजल्यावर तेथूनही विठ्ठलरावांना उपासनेच्या पाळ्या येऊ लागला. ३० जुलै १९०० रोजी मुंबई प्रार्थनासमाजामध्ये विठ्ठलरावांनी उपासना चालविली. विवेचनाकरिता त्यांनी ‘काय किर्ती करू लोकदंभ मान | दाखवी चरण तुझे मज |’ हा अभंग घेतला होता.

सुटीच्या काळात ते जमखंडीला गेल्यानंतर आपल्या घरी दर रविवारी मोठ्या थाटाने उपासना करू लागले. ह्या उपासनेसाठी बाहेरची मंडळीही जमू लागली. आपला मुलगा प्रार्थनासमाजाचा सभासद झाला हे रामजीबाबांना आणि यमुनाबाईंना फार आवडले. प्रार्थनासमाज म्हणजे आपल्या भागवत धर्माचीच सुधारलेली आवृत्ती आहे, असे त्यांना वाटू लागले. तुकाराम, एकनाथ, रामदास ह्यांच्या अभंगांची निरूपणे उपदेशाच्या वेळी होत असत. विठ्ठलरावांचे पोक्त वयाचे मित्र मीरासाहेब हथरूट ह्या मुसलमान गृहस्थास व त्यांच्या लिंगायत, ब्राह्मण मित्रांस प्रार्थनासमाजाच्या ह्या उपासनांचे कौतुक वाटत असे.

मुंबई प्रार्थनासमाजाचे अन्य काम करण्यातही त्यांना गोडी वाटत होती. थीइस्टिक मिशनच्या वतीने चालविल्या जाणा-या रात्रीच्या शाळांची व्यवस्था प्रार्थनासमाजाकडे आली होती. ह्या रात्रशाळा चेऊलवाडी, गिरगाव, गावदेवी, डोंगरी, खेतवाडी, भायखळा आशा वेगवेगळ्या वस्तींमध्ये होत्या. शिवाय महार, मांग, चांभार वगैरे अस्पृश्य मानलेल्या जातींच्या लोकांकरिता डोंगरीनजीक मदनपु-यामध्ये एक शाळा १८९० पासुन चालविली जात होती. ह्या शाळांवर देखरेख ठेवून तपासण्याचे काम विठ्ठल रामजी शिंदे, वा. स. सोहोनी व ए. बी. ओळकर हे करीत असत.२ मुंबई येथे शिंदे यांची आर्थिक स्थिती सुधारली होती अशातला भाग नव्हता. तरीही ते आपल्या कुवतीप्रमाणे प्रार्थनासमाजाच्या दुष्काळ फंडाला मदत करीत होते. त्यांनी दुष्काळ फंडाला एक रुपया दिल्याचा उल्लेख पाहावयास मिळतो.३ १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात प्रार्थनासमाजाच्या दृष्टीने एक दुःखदायक घटना घडली. न्यू इंग्लिश स्कूलमधील बुद्धिमान, पदवीधर शिक्षक श्री. मोती बुलासा यांनी १८९८ मध्ये प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली याचा उल्लेख आधी आलाच आहे. रे. डॉ. जे. टी. संडरलॅंड यांच्या सूचनेवरून ब्राह्मसमाजाच्या लायक होतकरू व्यक्तीस ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनच्या आर्थिक साहाय्याने धर्मशिक्षणासाठी ऑक्सफर्डला दोन वर्षे पाठविण्याची योजना सुरू झाली होती व ह्या योजनेनुसार सन १९०० मध्ये धर्मशिक्षणासाठी ऑक्सफर्डला पाठविण्यासाठी श्री. मोती बुलासा यांची निवड प्रार्थनासमाजाच्या शिफारशीनुसार कलकत्याच्या ब्राह्मसमाजाच्या कमिटीने केली होती. ह्या घटनेचा आनंद प्रार्थनासमाजीय मंडळींना झाला. श्री. मोती बुलासा हे १५ सप्टेंबर १९०० रोजी धर्मशिक्षणासाठी विलायतेला जाणार म्हणून त्यांच्या अभिनंदनार्थ पुण्यात तीन-चार ठिकाणी सभा झाल्या. शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर १९०० रोजी पुण्याच्या प्रार्थनासमाजात त्यांच्यासाठी डॉ. भांडारकरांनी एक विशेष उपासना चालविली.४ या प्रसंगी केलेल्या भाषणामध्ये डॉ. भांडारकरांनी विलायतेस धर्मशिक्षणासाठी जाण्याचे प्रयोजन काय व त्याची उपयुक्तता कोणती याबद्दल उत्तम विवेचन केले व श्री. मोती बुलासा यांना त्यांच्या कामी शुभेच्छा दिल्या. मोती बुलासा हे १५ सप्टेंबर रोजी बोटीने विलायतेस जाण्यास निघाले. परंतु दुर्दैवी घटना अशी घडली की, वाटेत पोर्ट सय्यद येथे वातज्वराचा विकार होऊन त्यांचे आकस्मिक निधन झाले. ही बातमी ऐकून पुणे व मुंबई येथील प्रार्थनासमाजीयांना फारच वाईट वाटले. डॉ. भांडारकर यांनी पुणे प्रार्थनासमाजात मोती बुलासांच्या दुखवट्यानिमित्त एक विशेष उपासना चालविली. याप्रसंगी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॉ. भांडारकरांजवळ जाऊन त्यांना “मोती बुलासांच्या निधनाने रिकाम्या पडलेल्या जागेसाठी मला जर गुरुवर्यांनी पात्र ठरविले तर मी विलायतेस जाण्यास तयार आहे” असे सांगितले. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा हा निर्णय विठ्ठलरावांनी अंतःप्रेरणेने कसा घेतला ह्याचे वर्णन प्रारंभीच्या प्रकरणात केले आहेच.

धर्मप्रचारासाठी आपले आयुष्य वाहण्याचा निर्णय घेऊन वेगळी वाट शिंदे यांनी का चोखाळली असावी बरे? त्या काळामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल साशंक असणारा अज्ञेयवादी वर्ग सुशिक्षितांमध्ये मोठ्या प्रमाणात होता. मिल्, स्पेन्सर, आगरकर ह्या विचारवंतांच्या प्रभावामुळे मुख्यतः शहरी सुशिक्षितांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण प्राधान्याने इहवादी, उपयुक्ततावादी आणि व्यक्तीवादी असाच होता. शहरी सुशिक्षितवर्ग हा खेडेगावपासून दुरावलेला. खेडेगावच्या लोकांच्या दुःखाबद्दल त्यांना आच नव्हती हे तर सोडाच, परंतु त्यांना त्यांच्याबद्दल नीटशी माहितीही नव्हती. अशा शहरी सुशिक्षितांपेक्षा शिंदे यांचे आकलन, जाणीव व दृष्टिकोण वेगळे होते.
 
धर्माचे विकृत स्वरूप त्यांनी ग्रामीण लोकांमध्ये पाहिलेले होते. विपर्यस्त धर्मकल्पनांनी, अंधश्रद्धांनी व धर्माच्या नावाने चालू असलेल्या रूढींनी लोकांची किती हानी होत आहे, हे त्यांनी पाहिले होते. धार्मिक रूढीच्या नावाखाली बुवाबाजीचे स्तोम माजले होते. त्यामुळे खेडेगावच्या लोकांची अनेक प्रकारे नागवणूक व छळणूक होत असे. कित्येकांच्या आयुष्याचे नुकसानही होत असे. मद्यपान, पशुबली इत्यादी अनाचार धर्माच्या नावाखाली चालू होते. धर्माच्या नावाने चालू असलेल्या रूढीमु्ळे खालच्या समजल्या जाणा-या जातीतील कित्येक मुली देवाच्या नावाने मुरळी म्हणून सोडल्या जात व आयुष्यभर निंद्य स्वरूपाचे वेश्येचे अथवा वेश्यासदृश जिणे जगावे लागत होते, हेही शिंदे यांनी पाहिले होते. धर्माबद्दलची नीतीवर आधारलेली रास्त कल्पना लोकांच्या मनामध्ये नसल्यामुळे अनेक प्रकारचे अनर्थ घडत होते, हे त्यांना उत्कटत्वाने जाणवत होते. तेव्हा धर्मामधील हीण काढून सर्वसामान्य माणसाला धर्माचे उज्ज्वल स्वरूप जाणवून दिले तर एकंदरीतच जीवनाची प्रत उंचावल्यासारखे होईल, असे त्यांचे चिंतन चालू असले पाहिजे.
 
उन्नत धर्मकल्पनेची सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जाणीव निर्माण करून धर्मसुधारणा करणे म्हणजे केवळ मानवी जीवनाच्या एका क्षेत्रात सुधारणा करणे असा धर्मसुधारणेचा मर्यादित अर्थ त्यांचा नव्हता. जीवनातील सर्वच कृत्यांच्या मुळाशी उन्नत धर्मविचाराचे नैतिक स्वरूपाचे अधिष्ठान असावयास पाहिजे, अशी शिंदे यांची कल्पना बनली होती. धर्म जीवनाच्या सर्वच अंगाला व्यापणारा असतो हा विचार राजा राममोहन रॉय यांच्या कर्तृत्वाचे आकलन करताना १९०३ सालच्या ऍमस्टरडॅम येथील  उदार धर्मपरिषदेत पुढे त्यांनी प्रकट केला आहे. नवसारीच्या १९०४ सालच्या वार्षिकोत्सवाच्या भाषणात त्यांनी म्हटल्याप्रमाणे धर्मसुधारणा ही केवळ एक सुधारणा नसून सर्व चांगल्याच्या मुळाशी असणारी ती गोष्ट आहे. म्हणून उदार धर्म हा विश्वधर्म होऊ शकतो.
 
तेव्हा धर्माच्या नावावर चालू असणा-या रूढीग्रस्त समाजातील विविध प्रकारची अनिष्टे निपटून काढून सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण जीवनाचा स्तर उंचवावयाचा असेल, त्याला नैतिक अधिष्ठान द्यावयाचे असेल तर उन्नत धर्मविचाराचा प्रसार करणे हाच अत्यंत परिणामकारक उपाय आहे, आशी शिंदे यांची चिंतनाच्या अंती मनोधारणा झालेली असणार. म्हणूनच अंतःप्रेरणेच्या एका विशिष्ट क्षणी त्यांनी आपले आयुष्य धर्मकार्याला वाहून टाकण्याचा निर्णय घेतला असणार.

विठ्ठलरावांची धर्मशिक्षण घेण्यासाठी विलायतेस जाण्याची तयारी आहे हे समजून डॉ. भांडारकरांना फार आनंद वाटला व त्यांनी विठ्ठलरावांना प्रेमाने कुरवाळले. मँचेस्टर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना काही प्रमुख अटी असत. अशा विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणामध्ये प्रगती झालेली असावयास पाहिजे. त्याचप्रमाणे ब्राह्म वा प्रार्थनासमाजाचे कार्य करण्याची त्यांच्यामध्ये पात्रता दिसून थोडेबहुत कार्यही त्यांच्या हातून झालेले असायला पाहिजे. ह्या गोष्टी ध्यानात घेऊन तो विद्यार्थी ज्या भागातला असेल त्या भागातील समाजाच्या सभासदांनी आणि कार्यवाहकांनी त्याची एकमताने शिफारस करायला पाहिजे. प्रांतिक समितीची शिफारस कलकत्त्यातील साधारण ब्राह्मसमाज आणि नवविधान ब्राह्मसमाज या शाखांच्या प्रतिनिधींच्या ब्राह्मसमाजाच्या कमिटीने पसंत करावयास पाहिजे. निवडलेल्या विद्यार्थ्याला वर्षाला १०० पौंड अशी स्कॉलरशिप दोन वर्षे देण्यात येई. मात्र प्रवासाचा खर्च विद्यार्थ्यालाच सोसावा लागे. मँचेस्टर कॉलेजमधील शिक्षणक्रम आटोपून स्वदेशी आल्यानंतर त्या विद्यार्थ्याने ब्राह्मसमाजाच्या प्रचाराचे कार्य आजन्म करावयाचे असते. निदान ह्या उद्देशाशी विसंगत असा उदरनिर्वाहाचा मार्ग अवलंबू नये. ह्याच्या उलट मात्र, अशा विद्यार्थ्याच्या योगक्षेमाबद्दल ब्रिटिश कमिटी, कलकत्त्यातील कमिटी किंवा दुसरी कोणी कायदेशीर हमी घेतलेली नसे. मोती बुलासांच्या रिकाम्या जागी स्कॉलरशिप घेऊन धर्मशिक्षणार्थ इंग्लंडला जाण्याची आपली तयारी आहे हे डॉ. भांडारकर यांच्याजवळ म्हणताना ह्या सा-या कडक अटी विठ्ठलरावांच्या मनात होत्या. घरची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. एल्. एल्. बी. ची अखेरची परीक्षा देण्याचे दिवस जवळ आले होते. बडोदा संस्थानात नोकरी मिळण्याची केवळ शक्यता होती, असे नव्हे तर नोकरी करण्याची अट त्यांनी मान्य केली होती. ह्या शिक्षणाच्या जोरावर मोठ्या पगाराची नोकरी त्यांच्या सहज आवाक्यात होती. अशा परिस्थितीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “कोणताही अडथळा मनात येऊ न देता किंबहुना त्याचा विचारही न करता केवळ परमेश्वरी आदेश समजून मी गुरुवर्य भांडारकरांकडे माझा निश्चय गंभीरपणे प्रकट केला. गुरूवर्यांनीही तो तितक्याच झटकापटकीने स्वीकारला.”

“डॉ. भांडारकरांनी मनात आणल्यावर प्रांतिक समाजाची, कलकत्त्याच्या समितीची, नंतर ब्रिटिश कमिटीची व अखेरीस मँचेस्टर कॉलेजची पसंती ह्या ओघाओघानेच मिळाल्या” असे नमूद करतानाच शिंदे यांनी मधेच जो एक व्यत्यय घडला त्याचा निर्देश केलेला आहे. तो म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी श्रीधर विष्णू परांजपे ह्या तरुणाची शिफारस केली होती. ह्या परांजप्यांच्या संदर्भात लिहीत असताना ग. त्र्यं. माडखोलकर यांनी म्हटले आहे, “त्यांच्या या विविध गुणांचा इतका परिणाम डॉ. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यावर झाला की, इंग्लड-अमेरिकेमधील युनिटेरियन पंथाने तुलनात्मक धर्मशिक्षणासाठी ठेवलेल्या शिष्यवृत्तीकरिता त्या दोघांनीही १९०० च्या डिसेंबरमध्ये त्यांची शिफारस केली. एकेश्वरवादाचे प्रचारक म्हणून ते उत्तम काम करतील, असा विश्वास प्रार्थनासमाजाच्या त्या दोघाही धुरिणांनी, आपल्या या शिफारशीच्या पत्रात, त्यांच्याविषयी व्यक्त केलेला होता.
तथापि, ती शिष्यवृत्ती युनिटेरियन पंथाचे प्रमुख डॉ. संडरलँड यांच्या कर्मवीर श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील लोभामुळे अखेर त्यांना मिळाली व परदेशात जाऊन तौलनिक धर्मशास्त्राचे अध्ययन करण्याचा श्रीधररावांचा योग हुकला.”५

स्कॉलरशिपसाठी असलेल्या अटी, विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया व विठ्ठल रामजी शिंदे यांची पात्रता विचारात घेता ग. त्र्यं. माडखोलकर यांचे वरील म्हणणे योग्य माहितीवर आधारलेले दिसत नाही. ह्या निवडीनंतर तीन वर्षांच्या आतच १८ मे १९०३ रोजी श्रीधर विष्णू परांजपे यांनी श्रीरामदासानुदास असे नाव धारण करून वर्धा शहरापासून सुमारे एक मैलाच्या अंतरावर असलेल्या एका टेकडीवर हनुमानगडाची स्थापना केली. एक ओटा बांधून त्यावर मारूतीची स्थापना केली व अभिनव ‘श्रीरामदास संप्रदायाचा’ प्रारंभ केला. मारुती हे त्यांचे उपास्य दैवत होते.६ परांजपे यांचा मूर्तिपूजेवर व अवतारवादावर विश्वास होता असे दिसते. यावरूनही ब्राह्मसमाजाच्या, प्रार्थनासमाजाच्या धर्मकल्पनेवर त्यांची अढळ श्रद्धा होती असे दिसत नाही.

शिंदे यांची निवड झाली खरी; परंतु पैशाची सोय काय हा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. प्रवासखर्चासाठी निदान दीड-दोन हजार रुपयांची आवश्यकता होती. त्याशिवाय पोशाखाचा खर्च, ते परत येईपर्यंत कुटुंबाच्या योगक्षेमाची तरतूद अशी खर्चाची कलमे त्यांच्यासमोर आ म्हणून उभी होती. त्याशिवाय दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे त्यांनी बी. ए. व एल. एल. बी. च्या खर्चासाठी श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून सुमारे दीड हजार रुपयांची स्कॉलरशिप घेतली होती. त्यासाठी बडोदे संस्थानात नोकरी करण्याची अट त्यांनी मान्य केली होती. परंतु मँचेस्टर कॉलेजची स्कॉलरशिप घेतली तर त्यांना बडोदे संस्थानातच काय कुठेही नोकरी करता येणार नव्हती आणि बडोदे संस्थानात नोकरी केली नाही तर स्कॉलरशिपची रक्कम परत करण्याचा कायदेशीर करार होता. या पेचातून मार्ग कसा काढावा या प्रचंड फिकिरीत विठ्ठलराव पडले असता त्यांना एकच उपाय दिसला, तो म्हणजे श्रीमंत सयाजीरीव गायकवाडांकडे जाऊन सगळा प्रकार त्यांना सांगून त्यांची मदत मागणे. त्याप्रमाणे महाराजांची भेट घेण्यासाठी ते १९०१ च्या फेब्रुवारीमध्ये बडोद्यास गेले. या भेटीचे त्यांनी वर्णन केले आहे ते असेः “भेट झाली. महाराज खरे दिलदार. ते हसून म्हणाले, “ काय शिंदे, आमच्या पैशाची काय वाट?” मी अत्यंत नम्रपणाने उत्तर केले, “महाराज, पत्करलेले कार्य ईश्वराचे आहे आणि ते आपल्यास पसंत पडण्यासारखेच आहे. धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादी प्रागतिक गोष्टींचे बाळकडू आपण आजपर्यंत पुष्कळच पाजीत आलेले आहात. आता तर विलायतेतील युनिटेरियन समाजाने माझा अर्ज पसंत केल्यावर ही चालून आलेली संधी आपण दवडणार नाही अशा भरवशावरच आपणाकडे आलो. मला प्रवासात लागणारे सुमारे दीड हजार रुपये जर आपण कृपाळूपणे द्याल तर अर्थातच माझे मागचे दीड हजार रुपयांचे ऋण फिटले असेच मी समजेन.” ऋण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून दयाळू महाराज हसले, “बरे आहे. शिंदे, तुम्ही यशस्वी होऊन या!” सेकंडक्लास डेकचे जाण्यायेण्याचे भाडे देण्याची हुजुराज्ञा झाली.”७
 
श्रीमंत सयाजीराव गायकवाडांनी विठ्ठलरावांना इंग्लडचा प्रवासखर्च तर मंजूर केलाच शिवाय संस्थानामध्ये नोकरी करण्याच्या अटीतूनही मुक्तता दिली हे वृत्त समजल्यानंतर समाजातील मित्रमंजडळींना फारच आनंद झाला. त्यांची प्रवासाची तयारी करण्याबाबत श्री. कोरगावकरांनी पुढाकार घेतला व इतर मित्रांनीही सढळपणे मदत केली. ह्या घटना नोव्हेंवर, डिसेंबर १९०० च्या सुमारास घडल्या. त्यांच्या सेकंड एल्. एल्. बी. च्या चारही टर्म्स भरल्या होत्या. कायदा बहुतेक वाचला होता. परीक्षेचा फॉर्म भरून मुंबई युनिव्हर्सिटीकडे फीही भरली होती. परंतु कायद्याकडे विठ्ठलरावांचा मुळातच कल नव्हता आणि आता तर ह्या परीक्षेला बसणे त्यांना निरर्थक वाटले. म्हणून परीक्षेला बसण्याचा विचार त्यांनी सोडून दिला.

याही पुढे विठ्ठलरावांच्या दृष्टीने आणखी एक कठीण प्रसंग होता तो म्हणजे आपल्या वृद्ध आईवडिलांना आपला विलायतेला जाण्याचा विचार व आपले आयुष्य धर्मकार्याला वाहावयाचे असा केलेला निश्चय कळवण्याचा. त्या वेळची स्वतःची मनःस्थिती आणि आईवडिलांची प्रतिक्रिया त्यांनी निवेदिली आहे. “उच्च शिक्षण दुर्मीळ असलेल्या त्या वेळी बी. ए., एल्. एल्. बी. वगैरे परीक्षा होऊन बडोद्यासारख्या संस्थानात माझी चांगली वर्णी लागण्याचा काळ इतका जवळ आला असताना त्या सर्वांवर निःशंक पाणी सोडून विलायतेसारख्या दूर देशात जाण्याचा मार्ग मी पत्करावा आणि तोही ऐहिक स्वार्थासाठी नसून परत आल्यावर फकिरी पत्करण्यासाठी! हे जेव्हा आईबाबांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल याचे दारुण चित्र मला दिसू लागले. शेवटी मला जेव्हा त्यांना सर्व प्रकार कळविणे भाग पडले तेव्हा वडिलांना धक्का बसून ते कित्येक आठवडे आजारी पडले. पण आश्चर्य हे की, माझ्या आईने धीर सोडला नाही. ती त्यांची वरचेवर समजूत घालू लागली. आपल्या निराशेचे दुःख आवरून धरून दोघेही मी स्वीकारलेल्या मार्गात मला यश मिळावे अशी प्रार्थना करू लागले. इतकेच नव्हे तर परत आल्यावर मी जे व्रत पत्करले होते. त्यात आपणही भाग घेऊ, असे आश्वासू लागले. मला धन्यता वाटू लागली.”८

मँचेस्टर कॉलेजची टर्म १९०१ च्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार होती. तोपर्यंत पाच-सात महिन्यांचा अवधी होता. या अवधीत विठ्ठलरावांनी पुण्याच्या किबे वाड्यातील नूतन मराठी विद्यालयाच्या हायस्कूलात इंग्रजी सहाव्या व सातव्या इयत्तेला इतिहास व इंग्रजी काव्य या विषयांचा शिक्षक म्हणूम का पत्करले. शाळेजवळच असणा-या जमखंडीकरांच्या वाड्यात त्यांनी बि-हाड केले. ह्या अवधीत त्यांचे धर्मसाधन उत्साहाने चालले होते. पुणे प्रार्थनासमाजाचा तिसावा वार्षिकोत्सव १९०१ च्या जानेवारी महिन्याच्या तिस-या आठवड्यामध्ये साजरा झाला. त्यामध्ये भरगच्च कार्यक्रम झाले. ह्या कार्यक्रमाचे अवलोकन केले असता त्या वेळी प्रार्थनासमाजाचे वार्षिकोत्सव कसे साजरे केले जात याची कल्पना येऊ शकते. ‘धर्मबाबतीत आमचे चालढकलीचे धोरण’ ह्या विषयावर डॉ. भांडारकर यांचे कळकळीचे इंग्रजीतून भाषण झाले. तेथील उपासना किती मनःपूर्वक आणि प्रेरक असत याची कल्पना आपल्याला श्री. गणपतराव कोटकरांनी चालविलेल्या उपासनेवरून येऊ शकते. श्री. गणपतराव आंजर्लेकर व त्यांचे चिरंजीव ह्यांनी आरंभीच भजनात आपल्या गाण्याने अगदी गुंगवून सोडले. नंतर गणपतराव कोटकरांनी शांत व गंभीर भाव उद्भूत केल्यानंतर त्यांची विश्वात्म्याची कोमल व उदात्त प्रार्थना चालली असता समस्त बंधू-भगिनींची अंतःकरणे तल्लीन होऊन श्रोतृवृंद चित्रात रेखल्याप्रमाणे तटस्थ बसला होता. नंतर ‘पंडित वाद वदे सो झूटा।’ ह्या कबिराच्या पदाच्या आधारे व ‘अन्नाच्या परिमळे, जरी जाय भूक । तरी का होती पाक घरोघरी ।’ ह्या तुकारामाच्या अभंगानुरोधाने उपदेश झाला. पोकळ विधिसंस्कार करण्याने अगर शुष्क वाद करून मोठमोठी सिद्धान्तमते स्थापण्याने धर्मसाधन होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपले सर्व भाव शुद्ध होऊन तदनुसारेच आपल्या सर्व कृती झाल्या म्हणजेच धर्माचरण केले म्हणावयाचे असे विस्ताराने प्रतिपादले. नंतर आरती होऊन साडेअकरा वाजता उपासना आटपली.

...संध्याकाळी चार वाजता महाराष्ट्रीय ब्राह्मसमाजात म्हणजे सातारकर जंगली महाराजांच्या बंगल्यात उपासना झाली. ती रा. वि. रा. शिदे यांनी चालविली. मंडळी सुमारे चाळीसपर्यंत हजर होती. ‘प्रथम भाव शुद्ध कर’ ह्या अभंगाच्या आधारे प्रपंचातच परमार्थ करावा अशासंबंधी उपदेश केला.

त्याच दिवशी साडेसहापासून रात्री साडेआठपर्यंत प्रार्थनासमाजात डॉ. भांडारकरांनी उपासना चालविली. ‘आता माझ्या भावा, अंतराय नको देवा’ ह्या अभंगाचे निरूपण करून डॉ. भांडारकर यांनी सांगितले की, प्रार्थनासमाजास आज तीस वर्षे झाली. ह्यावरून त्याची बाल्यावस्था संपून त्याने आता दृढपणे मूळ धरले आहे. प्रत्येक सभासदाने तुकारामाप्रमाणे आपला असाच भाव कायम राहावा अशा अर्थाची परमेश्वराजवळ प्रार्थना करावी व सर्व समाजसंस्थेनेही एकरूपाने तीच प्रार्थना करावी. आरंभी समाजात यावयाचे झाले तर अगदी चोरून यावे लागत असे. लाज, भीड, लोकनिंदा इत्यादी अडचणी दुःसह होत. पण आता तो प्रकार राहिला नाही. समाजाच्या बाहेरचे पुष्कळ लोक उपासना ऐकायला येत असतात. तर देवाजवळ आता फक्त निश्चयाचे बळ मागावे.९

ह्या उत्सवात २३ जानेवारी रोजी शिंदे यांनी एकदा व्याख्यान दिले व एकदा उपासना चालविली. भवानी पेठेतील ब्राह्मसमाजात त्यांनी महात्मा राजा राममोहन रॉय यांच्यावर व्याख्यान दिले व त्यांच्या चरित्रातील ठळक ठळक गोष्टींचे निरुपण करून ह्या विभूतीचे मोठेपण कशात आहे, तिने हिंदुस्थानवर कोणते उपकार केले आहेत व त्यांच्यासंबंधी निदान ब्राह्माने तरी आपले कर्तव्य कसे बजावले पाहिजे वगैरे गोष्टींचे नीट स्पष्टीकरण केले.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी सायंकाळी सहा वाजता मंदिरात माघोत्सवाची उपासना चालविली. “I hope in India, more than any where else, in the Brahm Samaj sooner than in any other communion, the principle of historical evolution of all religious thought will be recognised,” ह्या प्रो. मॅक्समुल्लरसाहेबांनी ब्राह्मसमाजासंबंधी काढलेल्या उद्गारांचे ऐतिहासिकदृष्ट्या विवरण करून सर्व धर्माचे परिणत स्वरूप ब्राह्म धर्मात कसे आले आहे हे त्यांनी दाखविले. बंगाल्यात ब्राह्म, मुंबईत प्रार्थना व पंजाबात आर्यसमाज इत्यादी नावांनी नुसते हिंदुस्थान देशातच नव्हे तर      युनिटेरिऍनिझम व युनिव्हर्सालिझम ह्या नावांनी इंग्लंड व अमेरिका वगैरे ठिकाणी धर्माचे संशोधन झपाट्याने चालले असून चहूकडे ब्राम्ह्य धर्माचाच प्रसार होत आहे असे सांगून तो सनातन आहे; इतकेच नव्हे तर पुढे सर्वसाधारण होण्याची चिन्हे स्पष्ट दाखविली.१०

Read more: धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन

धर्मप्रचारार्थ दौरा

१९ ऑक्टोबर १९०५च्या संध्याकाळी विठ्ठल रामजी शिंदे, रुबेन आणि स्वामी स्वात्मानंदजी यांनी राममोहन आश्रमात थोडा वेळ प्रार्थना केली आणि महाराष्ट्राच्या दौ-यासाठी प्रस्थान ठेवले. सायंकाळी साडेपाच वाजता ठाणे येथील श्री. दत्तात्रय मार्तंड गुप्ते वकील यांच्या घरी पोहोचले. गुप्ते वकील हे मुंबई समाजाचे सभासद होते. त्यांनी या मंडळींचे मोठ्या आनंदाने स्वागत केले व पुढील कार्यक्रम ठरविले. मुंबई समाजाचे सहा सभासद, सात हितचिंतक व आणखी काही मित्रमंडळी धरून वीसजण समाजाची आस्था बाळगणारी मंडळी आहेत हे ऐकून शिंदे यांना समाधान वाटले. भोजनानंतर रात्री गुप्ते यांच्या घरी
१०-१२ मंडळी जमली. रुबेन यांच्या एकतारीवर सुमारे तासभर भजन झाले. रुबेन यांचे एकतारीवादन विलक्षण चित्तवेधक असे. एकतारी वाजविताना रुबेन स्वतःतीमध्ये पूर्णपणे रंगून जात असत व ऐकणाराही त्या नादब्रह्मात गुंग होऊन जात असे. रुबेन यांचे भजन व प्रार्थना झाल्यानंतर शिंदे यांनी जमलेल्या मंडळींसमोर काही सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, वीस वर्षांपूर्वी येथे सद्धर्म समाज म्हणून मंडळी होती. ब्राह्मधर्माचे कार्य येथे नवे नाही. तुम्ही एवढी आस्थेवाईक मंडळी आहात तर पूर्वीच्या प्रयत्नाचा जीर्णोद्धार करावा. महत्त्वाकांक्षा किंवा अतिकांक्षा न बाळगता मंडळाची स्थापना करावी असे अखेरीस शिंदे यांनी आवाहन केले. त्यांनी अखेरची प्रार्थना केली व रुबेन यांनी आशीर्वचनपर पद गाइले. रुबेन कोणत्या प्रकारी पदे गात असत याची कल्पना त्यांनी त्या वेळी गाइलेल्या पुढील पदावरून येऊ शकते.

लाज मेरी राखो, श्रीहरी लाज मेरी राखो।
आशीर्वाद करो, कृपाहस्त शिष धरो।।
कौन योग्यता, प्रभुजी कौन योग्यता।
रखाऊ जो मैं नहीं करूं, तुम्ही भिक्षुता।।
तुम्हारा काज है, हरीजी तुम्हारा काज है।
जो करू मैं इसलिय, तुम्ही का लाज है।।१

दुस-या दिवशी रात्री आठ वाजता शिंदे यांचे जाहीर व्याख्यान झाले. त्यानंतर गुप्ते वकील यांच्या घरी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. गुप्ते वकिलांना समाजाचे सेक्रेटरी करण्यात आले. अशा त-हेने या द-याच्या प्रारंभी ठाणे येथे नवा प्रार्थनासमाज स्थापन करण्याचा शुभारंभ झाला.

दुस-या दिवशी हे तिघेजण नाशिक येथे जाण्यास निघाले. पूर्वी नाशकास न्या. रानडे, लालशंकर उमियाशंकर ही मंडळी असताना तेथे एक प्रार्थनासमाज होता व तो ब-यापैकी चालला होता. तेथे एक उपासना मंदिर बांधण्याचे रानडे यांच्या मनात होते. रानडे-लालशंकर यांच्या मागे समाजाची जबाबदारी प्रसिद्ध देशभक्त व देवभक्त गंगाधर नृसिंह केतकर यांच्यावर पडली. केतकर कालवश झाल्यानंतर अलीकडील पाच-सात वर्षांत त्यांच्यामागे प्रार्थनासमाजाचे काम उरले नव्हते.

नाशकास बापूसाहेब केतकरांचे चिरंजीव अप्पासाहेब यांच्याकडे उतरण्याच्या इराद्याने हे तिघे तेथे पोहोचले. परंतु तेच मुंबईस चालले होते. त्यामुळे ते सर्वजण नीलकंठराव पाटणकर वकील यांच्याकडे उतरले. पाटणकरांनी मोठ्या अगत्याने त्यांचा पाहुणचार केला. शहरात स्वदेशी चळवळ मोठ्या जोरात चालली होती. रामाच्या देवळात विद्यार्थ्यांनी परदेशी कापडाची होळी केली. या शहरात एक गिरणी काढण्याचे घाटत आहे व एका नवीन सहकारी देशी दुकानाची तयारी जोरात चालली आहे, हे ऐकून शिंदे यांना फार आनंद वाटला.

दुस-या दिवशी सायंकाळी पाटणकर वकिलांच्या घरी काही मंडळी खास बोलावण्यात आली. रुबेनचे भजन झाल्यानंतर शिंदे यांचे व्याख्यान झाले. हल्ली जगात धर्मविचारांचा व आचारांचा चहूकडे कसा जोराने विकास होत चालला आहे, हे त्यांनी थोडक्यात सांगितले. उदार धर्माच्या चळवळीत सामील होण्यापूर्वी व सामील होऊन प्रयत्न करीत असता आधुनिक मनुष्याने बुद्धी, सहृदयता आणि शक्ती या तिन्हीपासून आपली शीलसंपत्ती कशी वाढविली पाहिज याचा त्यांनी विस्ताराने विचार केला आणि मग प्रत्येकाना आपले व्यक्तीस्वातंत्र्य कायम ठेवून सामाजिक कार्य साधण्याची कशी आवश्यकता आहे हे सांगितले व शेवटी प्रार्थनासमाजाच्या तत्त्वाचेही दिग्दर्शन केले. हे विवरण करीत असताना शिंदे यांनी त्यांना दुसरीकडे आलेल्या अनुभवावरून आधीच इशारा केला की, रूढ धर्मातील शुद्ध स्वरूपाची व प्रार्थनासमाजीय मतांची पुष्कळ अंशांनी एकवाक्यता होण्यासारखी असून समाजाने चालवलेल्या अनेक सत्कृत्यांचा उच्चार करण्यासारखा आहे. काही मंडळींचे तिकडे दुर्लक्ष होण्याचा संभव आहे व केवळ काही आगंतुक आणि गौण गोष्टीस चिटकून राहिल्याने विनाकारण वाद माजण्याचा संभव आहे.

स्वात्मानंदजी यांचे भाषण झाल्यानंतर शिंदे यांनी आधीच भाकीत केल्याप्रमाणे वादप्रसंग उपस्थित झाला. काही मंडळी बळेच विरुद्ध पक्ष घेऊन प्रतिमापूजनाच्या तर्फेने ब्राह्मसमाजावर आक्षेप घेऊ लागली. जमलेल्या मंडळींतच परस्पर वाद सुरू झाला. दुस-या दिवशी जाहीर व्याख्यान व्हावयाचे होते. तेथे मूर्तिपूजेसारख्या रूढ धर्माला आधारभूत झालेल्या गोष्टीचा उल्लेख करू नये अशी अट घालण्याचाही काही मंडळींनी प्रयत्न केला. शिंदे यांनी “आम्ही आपल्या नेहमीच्या धोरणास अनुसरून व्याख्यान करू. जागोजागच्या लहरीप्रमाणे आम्हांस रंग बदलता येत नाही” असे स्पष्ट सांगितले. दुस-या दिवशी सोमवारी संध्याकाळी तेथील विजयानंद थिएटरात ‘धर्माची सामान्य भूमिका’ या विषयावर शिंदे यांचे व्याख्यान झाले. स्वामी स्वात्मानंद यांनी याच विषयाचा केवळ हिंदू धर्मग्रंथांच्या व संस्थांच्या आधारे विचार मांडला. पाटणकर वकिलांनी योग्य प्रकारे समारोप केला.

तारीख २४च्या संध्याकाळी अप्पासाहेब केतकर यांच्या घरी पुन्हा काही मंडळी जमली. कुष्णाजीपंत जोशी हे प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. त्यांनी प. वा. बापूसाहेब केतकर यांच्याप्रमाणे समाजाची उपासना वगैरे नियमितपणे चालवीण्याचे कबूल केले. जमलेल्या मंडळींतून समाजाला काही हितचिंतक मिळाले. समाजाचा कोणीतरी प्रचारक या स्थळी येऊन दोन-तीन महिने कायमचा राहून कार्य करील तर पुष्कळ यश येईल असे शिंदे यांना वाटले.२

पाटणकर वकिलांच्या सूचनेवरून नाशिक जिल्ह्यातील आसवले येथे राहणा-या अस्पृश्यवर्गातल्या एका श्रीमंत पुढा-याकडे ही मंडळी गेली. परंतु गृहस्थाने या मंडळींची भेट घेण्याचे टाळले.

त्यांचा पुढचा मुक्काम अहमदनगरमध्ये होता. आसवले येथे दुपारून निघणा-या गाडीत ते बसले व रात्री साडेबारा वाजता अहमदनगरास सहदेवराव बागडे यांच्या घरी पोहोचले. अहमदनगर समाजाचे एक मोठे आस्थेवाईक सदस्य रा. देशपांडे हे वाटेत येवले येथे राहत होते. त्यांच्या मदतीने तेथे बरेच काम करण्याजोगे होते. परंतु प्लेगमुळे लोक गावाबाहेर राहण्यास गेले होते. म्हणून येवल्यास जाणे उपयोगाचे नव्हते.

नाशकात स्वदेशीची चळवळ भराला आलेली त्यांना दिसली. पण येथे मात्र स्वदेशीबाबतीत सामसूमच आढळून आली. नगरात कापसाचा मोठा बाजार आहे. भोवतालचा कापूस येथूनच बाहेर रवाना होतो. कापसाचे गठ्ठे बांधण्याचा येथे एक कारखानाही आहे. असे असता येथे कापसाची एखादी गिरणी का उभारून नये? पण नगरात पिण्याच्या पाण्याची मारामारी आहे तर गिरणी कशी चालेल? निदान तूर्त देशी कोणकोणता माल मिळेल हे लोकांच्या नजरेत भरविण्यासाठी जागोजागी प्रदर्शन उघडल्यास काय हरकत आहे इत्यादी विचार स्वदेशी इसमाच्या मनात चालू असल्याचे शिंदे यांनी जाणून घेतले. नगर येथील ३० हजार लोकवस्तीपैकी ख्रिस्तीवस्ती ६ हजारावर आहे. शिवाय जिल्ह्यात ७ हजारावर ख्रिस्त्यांची वस्ती आहे. नगर हे महाराष्ट्रातील ख्रिस्ती मिशनचे मुख्य ठिकाण आहे. मि. चर्चहिल नावाच्या अमेरिकन इसमाने साठ हातमागाचा कारखाना व गालिच्यांचा कारखाना जोरात चालविलेला शिंदे यांनी पूर्वीच पाहिला होता. त्यामध्ये आता सव्वापट वाढ झालेली त्यांना दिसून आली. आपले लोक मात्र काहीही करीत नाहीत हे शिंदे यांना जाणवले.

दुस-या दिवशी सकाळी प्रार्थनासमाजाचे चिटणीस श्री. अभ्यंकर यांच्या अनुमतीने पुढील कार्यक्रम झाले. आलेल्या अनुभवावरून शिंदे यांनी प्रचारकार्याचे धोरण निश्चित केले होते. ज्या ठिकाणी समाजाचे काही कार्य प्रथमच करावयाचे असते तेथे वादग्रस्त विषयावरील व्याख्याने किंवा निषेधात्मक चर्चा होताहोईतो टाळावयाची. अशा ठिकाणी धर्मासंबंधी हल्ली जगाच्या सुधारलेल्या भागात जे उदार प्रयत्न चालू आहेत त्यांचे हेतू कसे निष्काम व निरभिमान आहेत; त्यांच्या मार्गात अडचणी काय आहेत व यश किती आले आहे; त्यांच्यामध्ये परस्परसंगती, सहानुभूती व सहकार्य कसे चालू आहे व या सनातन सार्वत्रिक धर्मकार्यासंबंधी स्वदेशी चळवळ ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजाने आज कित्येक वर्षे कशी चालविली आहे इत्यादी सामान्य विषयांवर केवळ माहितीच्या रूपानेच व्याख्याने देण्याचे व संवाद चालविण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे बहुतेक ठिकाणी वावदुकास वाव मिळत नाही, असा त्यांचा अनुभव होता.

अहमदनगर येथील प्रार्थनासमाज ३० वर्षांइतका जुना असल्याने येथे सामान्य पद्धतीने काम न करता काही विशिष्ट मतांचा व हेतूंचा ऊहापोह करणे शिंदे यांना जरूर वाटले. हे काम तोल साधून करणे आवश्यक आहे. मात्र उत्तरोत्तर कार्यात विशिष्टता व नवीनपणा आला पाहिजे म्हणून या खेपेस समाजाच्या संदर्भात अत्यंत वादग्रस्त ठरलेले मूर्तिपूजा व जातिभेद हे विषय घेण्यात आले. मूर्तिपूजेचा शेवट मानसपूजेत घडत असतो व जातीविषयक विचारात बंधुता व समता हा पाया महत्त्वाचा असतो, सबगोलंकार करणे नव्हे ही धारणा ठेवून या विषयावर शांतपणे ऊहापोह करणे हितकर व आवश्यक आहे असा शिंदे यांचा विचार होता. म्हणून नगर येथील ‘आनंदविहार’ नाटकगृहात २६ व २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ‘मानसपूजा’ व ‘बंधुभाव’ या विषयावर प्रथम स्वामींनी व नंतर शिंदे यांनी भाषणे केली.

तारीख २७ रोजी शुक्रवारी सकाळी समाजमंदिरात उपासना झाली. त्या वेळी शिंदे यांनी सगळ्या भारताचे एक राष्ट्र होणे कसे आवश्यक आहे याचे प्रतिपादन करणारे व्याख्यान धार्मिक भूमिकेतून दिले. आजच्या स्वदेशी चळवळीच्या काळामध्ये लोकांची मने जागृत झाली आहेत तेव्हा राष्ट्रघटनेचा सात्त्विक अर्थ व दैवी हेतू काय याचे विवरण त्यांनी या व्याख्यानात केले. ज्याप्रमाणे कुटुंबाची घटना, लहानसहान जातीची घटना ईश्वरी योजनेमुळे झाली त्याचप्रमाणे राष्ट्रांची घटना होणे हीही विश्वनियंत्याचीच योजना आहे. केवळ शिशुविकास व विषयासक्ती यांमुळे कुटुंब जसे बनत नाही, अपत्यप्रेम व स्वार्थत्याग या योगेच बनते त्याचप्रमाणे केवळ स्वार्थबुद्धी व परापहार या कराणाने कधी राष्ट्र होणे शक्य नाही. ईश्वरी योजनेला विघातक अशी राष्ट्रे झाली तर चोरांच्या टोळ्यांप्रमाणे त्यांचा शेवटी नाशच होतो. तर आपण जगाच्या विकासाची एक पायरी चढण्याच्या उदात्त हेतूने आमच्या लहान लहान जाती व प्रांतिक राष्ट्र यांचे एकच भारतीय महाराष्ट्र बनविणे ही ब्राह्म धर्माची एक आज्ञा आहे असे प्रतिपादन शिंदे यांनी या व्याख्यानांतून केले.

शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अकरा वाजता भिंगार गावी अंत्यज सुधारक मंडळींची पंधरवड्याची सभा भरली होती. निमंत्रणावरून शिंदे व त्यांचे दोघे सहकारी सभेला निघाले. सभेच्या ठिकाणातून अर्ध्या मैलावर अलीकडे वाटेवर सुमारे १०० आबालवृद्ध मंडळी भजनाची सर्व तयारी करून बसली होती. शिंदे आपल्या सहका-यांसमवेत तेथे पोहोचल्यावर मशाली पेटवून वारकरी थाटाची दिंडी निघाली व ती बाजारातून सभास्थानी साडेअकरा वाजता पोहोचली. त्या ठिकाणी अशा मध्यानरात्री अंत्यज मानलेल्या जातीचे सुमारे ३०० स्त्री-पुरुष नीटनेटका पोशाख करून उत्कंठेने जमले होते. सभेसाठी एक लहानसा सुंदर मंडप उभारला होता.

१० जून १९०५ रोजी या मंडळींची सभा प्रथम झाली होती. शिंदे हे या मंडळींच्या स्थापनाप्रसंगी हजर होते व त्यानंतरही या सभेत व्याख्यान देण्यासाठी ते एकदा आले होते. सहा महिन्यांच्या अवधीमध्ये या मंडळींनी कामाची मोठी प्रगती केली होती हे पाहून शिंदे यांना फार आनंद वाटला.

दिंडीमध्ये सातगावचे वृद्ध पाटील, पंढरीचे वारकरी मोठ्या आस्थेने सामील झाले होते. नीच मानलेल्या जातीस सुधारण्याचे काम जुन्या मताचे वृद्ध करतात व उच्च मानलेल्या जातीत मात्र ते केवळ तरुण नवशिक्यांवर पडते हा विरोधाभास शिंदे यांना मनोरंजक वाटला. पूर्वी ही सभा दर महिन्यास एकदा एकाच ठिकाणी भरत असे. ती आता दर पंधरवड्यास महारांच्या प्रत्येक मोहोल्ल्यात पाळीपाळीने भरते. तिच्या खर्चासाठी दर पंधरवड्यास पाव आणा घरपट्टी मोठ्या व्यवस्थेने वसूल केली जात होती. सभेच्या प्रारंभी श्री. पांडोबा डांगळे मास्तर यांनी सभेचे नियम वाचून दाखविले. मद्य न पिणे, खाण्यापिण्यात व पोशाखात स्वच्छता ठेवणे, सर्व लहान मुलांस शाळेत पाठविणे आणि विशेष करून उच्च वर्णातील लोकांस प्रसंगी टोचून न बोलणे व त्यांचा उलट मान राखणे इत्यादी अत्यंत समंजसपणाचे नियम ऐकून शिंदे व त्यांचे सहकारी यांना मोठा गहिवर आला. विशेषतः शेवटचा नियम ऐकून शिंदे यांना वाटले की, “नीच म्हणविणा-यांनी उच्च म्हणविणा-यांस सभ्यतेचा मोठाच धडा शिकविला ह्यात काही नीचाशिवाय इतरांस शंका येणार नाही.”३

भिंगार गावी या मंडळीने आपल्या जातीसाठी एक शाळा सुरू करण्याची म्युनिसिपालटीकडून परवानगी मिळविली आहे. नगर शहरात व भिंगार गावी यांच्यासाठी दोन वाचनालयाची स्थापना होणार असल्याचे शिंदे यांना समजले. या मंडळींनी अल्पावधीत केलेली ही प्रगती पाहून शिंदे यांना संतोष वाटला. स्वामी स्वात्मानंदजींनी उत्तेजनपर मोठे कळकळीचे भाषण केले. याच नमुन्यावर नगर शहरातील माळीवाड्यातील महार मंडळीनेही आपल्या जातीच्या उन्नतीसाठी सभेचे काम दर पंधरवड्यास चालविले आहे. २९ तारखेस रात्री या सभेस शिंदे आपल्या सहका-यांसमवेत उपस्थित राहिले. प्रार्थनासमाजाने या मंडळींस हरेक रीतीने मदत करणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी जाहीरपणे सुबोधपत्रिकेत आवाहन केले.

सभा संपल्यानंतर रात्री पाऊणच्या गाडीने शिंदे आपल्या सहका-यांसमवेत बारामतीस जाण्यास निघाले. ३० तारखेस दुपारी साडेअकराच्या सुमारास शिंदे, स्वामी स्वात्मानंदजी व डॉ. रुबेन बारामतीस पोहोचले. त्याच दिवशी संध्यकाळी मंडळींच्या भेटी झाल्या. श्री. रामकृष्ण बळवंत लोटलीकर, सबरजिस्टार यांच्या घरी डॉ. रुबेन यांचे एकता-यावर भजन झाले.

महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटी ह्या ग्रामीण भागात व अस्पृश्यवर्गालाही शिक्षण देणा-या संस्थेची स्थापना रामचंद्र आण्णाजी कळसकर यांनी केली होती. त्यांचे कार्य बारामती व बाजूबाजूच्या वांगी, कळस वगैरे गावी चालू होती. शिंदे हे बी. ए. चे विद्यार्थी असताना १८९८ मध्ये कळसकरांशी त्यांचा परिचय झाला होता. श्री. कळसकर यांची कामाची तळमळ व धडाडी पाहून शिंदे यांच्या मनात त्यांच्याबद्दल अतीव आदराची भूमिका निर्माण झाली. अस्पृश्यांसाठी आपणही काहीएक काम करावे ही प्रेरणा प्रथमतः कळसकरांच्या परिचयानंतर शिंदे यांच्या मनात निर्माण झाली. कळसकर यांनी स्थापलेली शाळा बघण्याचा व त्यांची कार्यपद्धती निरखण्याचा योग शिंदे यांना बारामतीच्या या भेटीत आला. मात्र कळसकर यांचे निधन नुकतेच झालेले होते. याची खंत शिंदे यांना मनोमन वाटली असणार. त्या वेळी महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून श्री. विष्णू रघुनाथ करमरकर हे काम पाहत होते.

३१ ऑक्टोबर रोजी सकाळी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सोसायटीचे कागदपत्र पाहिले. उद्योगशाळेतील मुलांची ड्रॉइंग, कार्पेंटरी वगैरे कामे पाहिली व इतर अभ्यासाची मुलांची परीक्षा घेतली.

सायंकाळी ७ ते ९ पर्यंत बारामती येथील क्लबात शिंदे व स्वामी स्वात्मानंदजी यांनी वेद व उपनिषदे यांस अनुसरून मानसपूजाच मुख्य आहे अशा मुद्यावर व्याख्यान दिले. रात्री दोन तास लोटलीकर यांच्या घरी भजन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्याच घरी ईश्वरोपासना झाली.

महाराष्ट्र व्हिलेज एज्यूकेशन सोसायटीच्या १६व्या  वार्षिक समारंभासाठी शिंदे हे १ नोव्हेंबर १९०५ रोजी संध्याकाळी ६ ते ९ उपस्थित राहिले. हा समारंभ सोसायटीचे प्रेसिडेंट मालेगावचे राजेसाहेब शंभूसिंगराव जाधवराव हे येऊ न शकल्याने रेव्ह. अलेक्झांडर रॉवर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ह्या प्रसंगी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी भाषण केले व शिणासंबंधी या सोसायटीचे महत्त्व, तिची उपयुक्तता व लोकाश्रयाची तिला असलेली आवश्यकता इत्यादी बाबींबद्दल मार्मिक असे विवेचन केले. या प्रसंगी स्वामी स्वात्मनंदजी यांनी हिंदुस्थानीत धंदे-शिक्षणाच्या संबंधी भाषण केले.

बारामती येथील मुक्कामाचे चांगले फलित म्हणजे तेथे झालेली प्रर्थनासमाजाची स्थापना. १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत श्री. लोटलीकर सबरजिस्टार यांच्या घरी त्यांच्याच अध्यक्षतेखाली प्रर्थनासमाजाची स्थापना झाली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सुपरिटेंडेंट रा. नारायण मारुतीराव नवले यांना प्रार्थनासमाजाचे सेक्रेटरी नेमले. आठ-दहा व्यक्ती समाजाच्या सभासद झाल्या. अशा प्रकारे कार्यभाग आटोपल्यानंतर शिंदे व त्यांचे सहकारी रात्रौ दीडच्या सुमारास पंढरपुरास जाण्यासाठी निघाले.४ हा प्रवास त्यांनी बैलगाडीने केला.

पंढरपूर येथे प्रार्थनासमाजाने चालविलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये तिघेजण उतरले. बारामती येथील कामानंतर डॉ. रुबेन ह्यांनी निरोप घेतला व त्यांच्या जागी लक्ष्मण मलकू सत्तूर हे दाखल झाले होते. अशा प्रकारच्या प्रचारकार्यात कोणाच्यातरी खोडसाळपणामुळे फजिती होणे वा चमत्कारिक प्रसंग ओढवणे हे शिंदे ह्यांना जमखंडी येथील प्रसंगावरून अनुभवास आले होते. पंढरपूर येथे असाच प्रसंग त्यांच्या वाट्याला आला. तेथील हायस्कूलचे प्रमुख श्री. मोडक हे शिंदे यांच्या परिचयाचे होते. शिंदे ह्यांचे व स्वात्मानंदजी यांचे अशी दोन व्याख्याने श्री. मोडक यांनी आपल्या शाळेमध्ये ठरविली होती व तशी जाहिरातही केली होती. पण मोडक महाशयांचा डाव वेगळाच होता हे व्याख्यानाच्या वेळी शिंदे व स्वात्मानंदजी यांच्या ध्यानात आले. कारण व्याख्यानाची वेळ होऊन अर्धा तास उलटून गेला तरी शाळेत एक चिटपाखरूही आले नाही. हेडमास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी केल्यामुळे व्याख्यात्यांचा असा कोंडमारा झाला होता. त्यांच्यासमोर रिकामी बाके होती. स्वामी स्वात्मानंदजी मोठे करारी होते. ते म्हणाले, “शिंदेजी, आज हम व्याख्यान करेंगे, आप सुनिए. कल आप कीजिए और मै सुनुंगा”। व त्यांनी संपूर्ण व्याख्यान दिले दुस-या दिवशी शिंदे ह्यांनी तसेच केले, असे हे ‘पंढरीमहात्म्य’ अनुभवल्यावर शिंदे यांना तुकारामबुवांचे वचन आठवले, ‘हा तो काही नव्हे निराशेचा ठाव। भलें पोटीं वाव राखिलिया’।।५

शिंदे यांना सोलापुरात मात्र चांगला अनुभव आला. तेथील सरकारी वकील रा. नागेश पै यांच्याकडे शिंदे उतरले. रिपन हॉल येथील रिपनक्लबात १८ तारखेस त्यांचे व्याख्यान झाले. युवराजाच्या सन्मानार्थ सगळीकडे रोषणाई केलेली होती. ह्या प्रसंगाच्या निमित्ताने शिंदे यांनी ‘देशभक्ती आणि देवभक्ती’ या विषयावर व्याख्यान दिले. आपल्यातील आध्यात्मिक उणीवा म्हणजेच राष्ट्रीय ऐक्याचा अभाव होय. सुखदुःखाच्या प्रसंगी राष्ट्राचे वर्तन जणू एखाद्या व्यक्तीच्याच वर्तनासारखे होणे ही राष्ट्रीयता निर्माण झाल्याची खूण असते व देशसेवेच आद्य तत्त्व म्हणजे राष्ट्रीय ऐक्य वाढविणे हे होय, अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केले. व्याख्यानावर चांगली चर्चा झाली. त्यानंतर पुढचा दौरा विजापूर येथे केला. तेथील एका थिएटरात व्याख्यान दिले व ब्राह्मो पोस्टल मिशनचे साहित्य सढळ हातांनी वाटले. विजापूरहून ते हुबळी येथे गेले. तेथील म्युनिसिपल हॉलमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. धारवाड, बेळगाव येथेही दौरा करून धर्मप्रचारार्थ त्यांनी व्याख्याने दिली व हा दौरा आटोपून ते मुंबईस परत आले.

एवढ्या अवधीत शिंदे ह्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई ह्यांचा आजार बरा होण्याऐवजी वाढला होता. अशातच मुंबईत प्रार्थनासमाजाने काशी येथे भरणा-या भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी प्रतिनिधी म्हणून शिंदे ह्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला होता. ही जबाबदारी त्यांना पत्करावी लागली. धर्मपरिषदेचे काम आटोपल्यानंतर बंगाल, बिहार, आसामच्या लांबच्या दौ-यावर ते निघाले. शेवटी बारीसाल येथे त्यांचे जाहीर व्याख्यान चालू असतानाच त्यांना घरून एक तातडीची तार आली. सौ. रुक्मिणीबाई यांच्यावर मुंबईत एक अवघड ऑपरेशन झाले व अहमदनगर येथे त्यांची बहीण चंद्राबाई ही अत्यवस्थ आहे असा मजकूर तारेत होता. अर्ध्यावर टाकून शिंदे ह्यांना परत यावे लागले. अहमदनगरास ते पोहोचल्यानंतर आपल्या आवडत्या बहिणीचे त्यांनी दर्शन घेतले व पुन्हा येतो असे आश्वासन देऊन पत्नीच्या समाचारासाठी मुंबईस गेले. पण चंद्राबाईंची ही भेट अखेरचीच ठरली दुस-या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी १९०७ रोजी चंद्राबाईंच्या निधनाची त्यांना बातमी समजली. बहिणीच्या गंभीरपणाच्या आजारपणाच्या काळात व अखेरच्या दिवसात आपण तिच्याजवळ राहू शकलो नही याचे त्यांच्या मनाला फार दुःख झाले.

धर्मप्रचारकार्यासाठी त्यांची अखंड धावपळ चालू होती.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २२ ऑक्टोबर १९०५.
२.    सुबोधपत्रिका, ५ नोव्हेंबर १९०५.
३.    सुबोधपत्रिका, १२ नोव्हेंबर १९०५. भिंगार येथील अस्पृश्यवर्गाच्या प्रस्तुत सभेचा भावनिक परिणाम आपल्या मनावर कसा झाला व त्याची परिणती डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या स्थापनेत कशी झाली याचे विवेचन शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात केले आहे. त्याचा उपयोग प्रस्तुत चरित्राच्या पहिल्या प्रकरणात केलेला आहे.
४.    सुबोधपत्रिका, १२ नोव्हेंबर १९०५, विष्णू रघुनाथ करमरकर यांनी पाठविलेले पत्र.
५.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १७४.

धर्मप्रचाराचे विस्तारित कार्य

विठ्ठल रामजी शिंदे यांनी धर्मप्रचार करण्याच्या बाबतीत आणखी एक नवा उपक्रम सुरू केला. प्रार्थनासमाजाच्या वतीने सहा रात्रशाळा चालविल्या जात होत्या व तीमध्ये ३१२ विद्यार्थी होते. त्यांपैकी ५७ विद्यार्थी नीच मानलेल्या वर्गातील होते. ह्या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी दिवसा गिरण्या-कारखान्यात, ऑफिसात कामकरी, शिपाई, मजूर म्हणून काम करणारे असत. शिंदे ह्यांना तर पांढरपेशा मुलांपेक्षाही रात्रशाळेतील त्या लोकांच्या धर्मशिक्षणाची व्यवस्था करणे जास्त गरजेचे वाटत होते. कारण त्यांना दिवसभर पोटाच्या उद्योगामागे लागणे भाग पडत असे. म्हणून खेड्यातील लोकांइतकादेखील त्यांना धर्मबोध नसे. उलट त्यांची नीती मात्र बिघडण्याचा पुष्कळ संभव असे. म्हणून रात्रशाळेतील त्या प्रौढ विद्यार्थ्यांच्या धर्मशिक्षणाची त्यांनी व्यवस्था केली.

शिंदे स्वतः १५ दिवसांनी प्रत्येक शाळेत जात असत. तेथे एखाद्या अभंगाचा ते अर्थ सांगत व त्याच्याच आधारे ते एक व्याख्यान देत. नंतर शाळेतील शिक्षक दररोज तो अभंग मुलांकडून म्हणवून घेत असत व त्याच्या आधारे बोध करीत असत. त्यामुळे काही अभंग मुलांकडून सहज पाठ होत असत. त्याचप्रमाणे दर पंधरा दिवसांनी सर्व रात्रशाळांतील मुले एकत्र जमवून त्यांस धर्मपर अथवा एखाद्या विषयावर व्याख्यान दिले जात असे. एकदा मद्यपाननिषेधक संस्थेचे चिटणीस मि. गिल्डर ह्यांनी मद्यपानापासून होणा-या घातक परिणामाची चित्रे दाखविली व एक व्याख्यानही दिले.

रात्रशाळांमध्ये धर्मशिक्षणाचा ह्या प्रकारचा उपक्रम सुरू केल्यापासून सुमारे ३ महिन्यांच्या अवधीनंतर ५ ऑक्टोबर १९०४ या तारखेस रात्रशाळेमध्ये एक विशेष समारंभ आयोजित केला. दिलेल्या धर्मशिक्षणासंबंधी परीक्षा घेऊन तीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना बक्षिसे देण्याचा हा समारंभ सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी शिंदे ह्यांनी रात्रशाळांमध्ये धर्मशिक्षणाची आवश्यकता, अवलंबिली जाणारी पद्धती ह्यासंबंधी माहिती दिली. कामाठीपुरा येथील शाळेचे शिक्षक रा. जोशी हे अंत्यज मुलांशी अत्यंत मनमिळावूपणाने वागून शिकवीत असत. तसेच गावदेवीच्या शाळेच्या हेडमास्तर रा. सावे हे शिस्तशीरपणे शाळा चालवून मुलांना टापटिपीचे, शिस्तीचे वळण लावत. त्याबद्दल ह्या दोन्ही शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. शिंदे यांच्या भाषणानंतर सीतारम नामदेव (शिवतरकर) व सीताराम महादेव ह्या दोन अंत्यज मुलांचा मद्यपाननिषेधसंबंधी फारच उत्तम असा संवाद झाला. सर भालचंद्र ह्यांनी बक्षिसे वाटल्यानंतर धर्मशिक्षण देण्याच्या ह्या उपक्रमाचे त्याचप्रमाणे मद्यपानासारख्या घातूक सवयीबद्दल जागृती करण्याच्या कामाचे महत्त्व सांगून ह्या प्रकारचा उपक्रम चालविणारे धर्मप्रचारक शिंदे व त्यांना साहाय्य करणारे शाळेतील शिक्षक ह्यांना धन्यवाद दिले.१ प्रार्थनासमाजाच्या रात्रशाळांच्या बाबतीत दुसरी एक उत्साहवर्धक घटना घडली, ती म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांच्या हस्ते झालेला बक्षीस समारंभ. १९०४च्या नाताळात काँग्रेसचे अधिवेशन मुंबई येथे भरले. सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान ह्यावर्षी महाराजांना द्यावयाचे ठरले होते. ह्याचवेळी एकेश्वरी धर्मपरिषदेची पुनर्घटना करून तिचे अधिवेशन मुंबईस करण्याच्या कामी शिंदे ह्यांनी पुढाकार घेतला होता. त्या वेळी मुंबई प्रार्थनासमाजास भेट द्यावी व समाजाच्या रात्रीच्या शाळांच्या बक्षीस समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे म्हणून श्रीमंत सयाजीराव गायकवाडांना निमंत्रण देण्यासाठी शिंदे हे बडोद्यास गेले व महाराजांनी ते निमंत्रण स्वीकारले. ह्या ठरविलेल्या कार्यक्रमानुसार ३० डिसेंबर १९०४ ह्या दिवशी सयाजीराव गायकवाडांच्या हस्ते रात्रीच्या शाळेतील विद्यार्थांना बक्षिसे वाटण्यात आली. धर्मासंबंधी त्यांनी विचार स्पष्टपणे लोकांसमोर ठेवले. त्याप्रसंगी सयाजीराव महाराजांनी प्रार्थनासमाजास भेट दिली. त्या निमित्ताने डॉ. भांडारकर ह्यांनी त्यांच्या गळ्यात हार घातला व न्या. चंदावरकरांनी स्वागतपर भाषण केले.

१२ फेब्रुवारी १९०४ रोजी ब्रिटिश अँड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे सेक्रेटरी यांच्याकडून पत्र आले. त्यामध्ये सेंट्रल पोस्टल मिशन, लंडन या संस्थेने प्रार्थनासमाजामार्फत पोस्टल मिशनचे कार्य यशस्वी रीतीने चालविल्याबद्दल शिंदे आणि सुखटणकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला अशी माहिती कळविली. त्यानंतर ह्याच संस्थेच्या सेक्रेटरीकडून ११ ऑक्टोबर १९०४ रोजी आणखी एक पत्र आले. त्यामध्ये “पोस्टल मिशनच्या कामाचा विस्तार करण्यासाठी उदार धर्मवाचन ग्रंथाचा एक विशेष वर्ग चालवून त्यात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना पारितोषिके देण्याची व्यवस्था करीत असल्यास तूर्त १०० रुपयांची देणगी पाठवू काय?” असे विचारले होते. कलकत्त्यास हेमचंद्र सरकारने असा वर्ग काढला होता व त्यांना अशी देणगी देण्यात आली. उदार धर्मवाङमयाचा प्रसार हिंदुस्थानात अधिक प्रमाणात करण्यासाठी ब्रिटिश अँण्ड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचा प्रतिनिधी या नात्याने आपली इतर कामे सांभाळून काम करण्याची शिंदे यांची तयारी आहे काय? अशी विचारणा केली होती. शिंदे यांची तयारी असल्यास अशा वाङमयाचा साठा गरजेप्रमाणे पुरवण्याची व त्यासाठी लागेल तो खर्च वेळोवेळी रोख पाठविण्याची तयारी दाखविली होती. शिंदे यांनी उत्तरी कळविले की, “मी हा विशेष वर्ग चालविण्याचे कार्य आधीच सुरू केले आहे. या वर्गातील हजेरी पटावर सुमारे ३० अंडरग्रॅज्युएट्सची नावे आहेत. तूर्त विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत गुंतले असल्यामुळे हा वर्ग बंद ठेवण्यात आला आहे. योग्य वेळी सालोसाल तो पुढे चालू होईल.”

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, ९ ऑक्टोबर १९०४.

  1. दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने
  2. दक्षिण किना-यावरील पंधरवडा
  3. जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य
  4. जनाबाईंचे शिक्षण
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121
  • 122
  • 123
  • 124
  • 125
Page 121 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी