1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

ऍमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषद

ऍमस्टरडॅम येथील परिषदेला अद्यापि अवधी असल्याने हा मधला जुलै-ऑगस्ट असा दोन महिन्यांचा काळ विठ्ठल रामजी शिंदे यांना वेगवेगळ्या ठिकाणी उपासना चालविण्यासाठी, परिचितांकडे राहण्यासाठी आणि काही स्थळे बघण्यासाठी मिळू शकणार होता. ऑक्सफर्ड सोडल्यानंतर ते प्रथमतः चेल्टनहॅम येथे रेव्ह. जोन्स जे. फिशर ह्यांच्याकडे एक आठवडा राहण्यासाठी गेले. तेथील बेंझ हिल् चर्चमध्ये रविवारी सायंकाळची उपासना त्यांनी चालविली. चेल्टनहॅम हे गाव त्यांना टुमदार व सुंदर वाटले. तेथे अँग्लो इंडियन व आय. सी. एस्. पेन्शनरांची वसाहत होती. नंतरच्या भ्रमंतीत ३१ जुलैला सेव्हन स्प्रिंगज् ह्या नावाने प्रसिद्ध असलेला टेम्स नदीचा उगम पाहिला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते कार्डिफला गेले. तेथे वेस्ट ग्रुव्ह चर्चमध्ये रविवारच्या सकाळ-संध्याकाळ अशा उपासना चालविल्या.

तेथे त्यांनी ब्राह्मसमाज ह्या विषयावर उपदेश केला. हा उपदेश नंतर इंग्रजीत पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. कार्डिफ येथील वास्तव्यात ते फ्रेडरिक चाईल्ड यांचे पाहुणे म्हणून राहिले. न्यूटन एबेट ह्या गावातील युनायटेड फ्री चर्चमध्ये १६ ऑगस्टच्या रविवारी सायंकाळी उपासना चालविली. अशा प्रकारे भ्रमंती करून ते लंडनला परत आले.

इंग्लंडहून हिंदुस्थानला परत येण्याच्या खर्चाबाबत मध्यंतरी उपस्थित झालेले विघ्न दूर झाले होते. युरोपमधील वास्तव्याचा काळ वाढल्याने लागणा-या अधिकच्या खर्चाची व्यवस्था झाली होती. आर्थिक अडचणींचा भार त्यांच्या मनावर राहिला नव्हता. परिषदेत वाचावयाचा निबंध त्यांनी लिहून आधीच पाठविला होता. ह्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे हे निर्वेध मनाने ऍमस्टरडॅमला निघू शकले.

३१ ऑगस्ट १९०३ रोजी सकाळी होबर्न येथून निघणा-या बोटीने इंग्लंडमधील प्रतिनिधी मंडळीही निघणार होती. शिंदे हेही त्यांच्यासमवेत या बोटीने निघाले. लंडनला व इंग्लंडला त्यांनी शेवटचा राम राम केला. जर्मन सीमधून प्रवास करून ही बोट ऍमस्टरडॅम येथे पोहोचली.

परिषदेस १ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. तो उन्हाळ्यातील एक आल्हाददायक दिवस होता. ऍमस्टरडॅमची शोभा याच दिवसात सर्वोत्तम असते. ऍमस्टरडॅमला उत्तर युरोपकडील व्हेनिस म्हटले जात असले तरी ते एक अतुलनीय शहर आहे. समुद्राच्या उच्छवासाच्या टप्प्यात सूर्यप्रकाशाने शोभिवंत दिसणारे रस्ते आणि रंगविलेली त-हेदार घरे, कितीएक कालव्यांची वर्तुळे असलेली ऍमस्टेल नदी आणि वृक्षांनी आच्छादित अनेकविध गल्ल्या या सा-यामुळे ऍमस्टरडॅम शहराला पूर्णपणे शोभा आलेली आहे. नदीच्या काठावरच्या सुंदर ऍमस्टेल हॉटेलात काही पाहुण्यांची व्यवस्था केली होती. विठ्ठल रामजी शिंदे येथेच उतरले होते.

परिषद
हॉल ऑफ द काँग्रेगेशन नावाच्या भव्य इमारतीत परिषदेचे काम सुरू झाले. येशू ख्रिस्त व अनेक ख्रिश्चन संतांची, त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या धर्मसुधारकांची व विचारवंतांची भव्य चित्रे तेथे लावलेली होती. १ सप्टेंबरला संध्याकाळी ओल्ड वॅलून चर्च ह्या फ्रेंच प्रॉटेस्टंट चर्चमध्ये रेव्ह. जे. व्हॉन लोयनेन मार्टनेट यांची डच भाषेतून अत्यंत प्रभावी उपासना झाली. या उपासनेनंतर फ्री काँग्रेगेशनच्या नेदरलँड कमिटीच्या वतीने प्रतिनिधींच्या स्वागताचा कार्यक्रम झाला. डॉ. वुर्ट हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आणि मि. ह्यूजेनहोल्ड यांनी इंग्लिश, जर्मन व फ्रेंच भाषांमधून विविध देशांतील प्रतिनिधींचे मनापासून स्वागत केले. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, हंगेरी, हिंदुस्थान आणि जपान ह्या प्रत्येक देशाच्या प्रतिनिधींपैकी एकेकाने उत्तरादाखल भाषण केले.१

डी हरव्होर्मिंग (दि रिफॉर्म) ह्या साप्ताहिकाने २९ ऑगस्ट १९०३ च्या अंकामध्ये म्हणजे परिषद सुरू होण्याआधी सर्व महत्त्वाच्या प्रनिनिधींची माहिती त्यांच्या छायाचित्रांसकट प्रसिद्ध केली होती. पाश्चात्त्य धर्तीचा पोशाख, मात्र डोक्याला फेटा असा विठ्ठल रामजी शिंदे यांचा फोटो त्यामध्ये छापण्यात आला व त्यांच्या जीवनातील चरित्रविषयक महत्त्वाच्या बाबी ग्रथित करणारा परिचय देण्यात आला. त्यांचे जन्मसाल, त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, हिंदू धर्मातील रूढीबद्दल त्यांच्या मनात निर्माण झालेले असमाधान, त्यांचा उदार धर्माकडे ओढा वगैरे बाबींचा त्यामध्ये मार्मिकपणे निर्देश केलेला असून लवकरच ते हिंदुस्थानात परत जाऊन धर्मप्रचाराचे कार्य सुरू करणार आहेत व प्रस्तुत परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदार धर्मासंबंधी विवेचन करणार आहेत असे नमूद केले आहे.

उदार धर्माच्या ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी एकंदर एक हजार प्रतिनिधी आले होते. त्यांपैकी सुमारे अडीचशे प्रतिनिधी अन्य देशांतील होते. प्रो. जे. ई. कार्पेंटर, प्रो. जाँ रेव्हील, प्रो. आर्मस्ट्राँग यांसारखे अनेक निष्ठावंत युनिटेरियन व नामवंत विद्वान आलेले होते. २ सप्टेंबर रोजी म्हणजे परिषदेच्या दुस-या दिवशी प्रो. क्रॅमर, आर्मस्ट्राँग, ब्रुइनिंग, होकार्ट, शिलर आणि त्याचप्रमाणे शिंदे यांची व्याख्याने झाली. न्यू रॉटरडॅम करंट ह्या डच वृत्तपत्राने इतर महत्त्वाच्या वक्त्त्यांच्या बरोबरीने शिंदे यांच्या व्याख्यानाचे संपूर्ण प्रतिपादन थोडक्यात ग्रथित करणारा सविस्तर वृत्तान्त दिलेला आहे.२

विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात अलीकडच्या काळात उदय पावलेल्या उदार सुधारक धर्मपंथाच्या स्वरूपाची माहिती देऊन वस्तुनिष्ठपणे विवेचन केले आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी त्यांनी हिंदुस्थानातील पारंपरिक हिंदू धर्माचे स्वरूपही नेमकेपणाने विशद केले. “धर्म ही बाब प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणाची असल्यामुळे आस्थेवाईक मनुष्याचा खरा धर्म सर्वत्र सारखाच असणार व मनुष्याच्या सुधारणेबरोबरच धर्माच्या प्रगतीची दिशाही सारखीच असणार” ही गृहीत भूमिका नमूद करून त्यांनी असे विधान केले की, ह्या दृष्टीने पाहता पाश्चात्त्य देशांतील प्रसिद्ध विद्वान मनुष्यांनी हिंदू धर्माची तत्त्वे आणि आदर्श जितक्या मानाने समजून घेतलेले आहेत तितक्या मानाने पाश्चात्त्य देशातील धर्मशास्त्रवेत्यांनी घेतले नाहीत.

हिंदुस्थानातील नव्या आणि उदार धर्माच्या चळवळीचे वर्णन करण्यापूर्वी तेथील पुराण धर्माची स्थिती कशी आहे हे सांगणे आपल्याला अगत्याचे वाटते असे म्हणून हिंदुस्थानातील सनात हिंदू धर्माची ठळक वैशिष्ट्ये त्यांनी प्रारंभी नमूद केली. “मागे किंवा आता हिंदुस्थानामध्ये धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानता येते, परंतु मृत भाषेतील या धर्मग्रंथाच्या अर्थाची ओढाताण पाहिजे तशी करता येत असल्यामुळे साधारण माणसाच्या मार्गामध्ये धर्मग्रंथाचा फारसा अडथळा येत नाही. उपासना ही एक स्थानिक बाब होऊन बसली आहे. म्हणजे काही विशिष्ट स्थळे आणि प्रतिमा ह्यांनाच महत्त्व आलेले आहे. प्राचीन काळापासून पवित्र मानली गेलेली क्षेत्रे आहेत. शहरोशहरी शृंगारलेली भव्य देवळे आहेत. इतकेच नव्हे तर घरोघरी देवघर म्हणून एक स्वतंत्र खोली असते व त्यामध्ये काही निवडक देवांचा देव्हारा असतो... पाश्चात्त्य देशातल्याप्रमाणे हिंदू धर्माची संघसंस्था (चर्च) कधीच बनलेली नाही.” हे सांगून ते म्हणाले, “हिंदू धर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातींचा जो एक मोठा व्यूह बनलेला आहे त्याचे द्वारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर रचला आहे... हिंदुस्थानामध्ये ज्याचे खरे जुलमी साम्राज्य चालू आहे तो आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कोणी नसून चालू वहिवाट हीच होय.”
 
ख्रिस्ती आणि महंमदी हे दोन धर्म बाहेरून आलेले आहेत त्यांचा कल साह्य करण्यापेक्षा जय मिळविण्याकडे विशेष असल्याने आध्यात्मिक बाबतीत ते काही करू शकले नाहीत. आत्म्याच्या खास उत्पत्तिस्थानात उगम पावून सर्व मनुष्यजातीचा जो एक साधारण धर्म निघणार आहे त्यातच हिंदू धर्माची शुद्धी व उद्धार होणार आहे, असे त्यांनी विधान केले व ह्या साधारण धर्माची वाट खुली करणारी हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज ही एक मोठी वैभवशाली शक्ती आहे असे त्यांनी सांगितले व ब्राह्मधर्माचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांच्या थोरवीचे मार्मिक वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, “त्याचा धर्म म्हणजे एक मत किंवा मनोवृत्ती नसे तर साक्षात जीवन होता व ते जीवनही सर्व बाजूंचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युदय, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठी त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली.” ब्राह्मसमाजात सत्य, न्याय व सहिष्णुता यांची एकवाक्यता आढळते. जगातील बहुतेक सर्व मुख्य धर्मग्रंथांत आपल्या सनातन धर्माची बीजे आढळतात हे राजा राममोहन रॉय यांना आढळून आले. जगातील सर्व पवित्र वाङ्मय ही देवाने दिलेली सामाजिक देणगी मानावे असे ब्राह्मधर्माचे एक तत्त्व आहे. ब्राह्म हा सदैव स्वतःच्या विवेकशक्तीचा उपयोग करीत असतो. धर्माध्ययनाच्या सर्व क्षेत्रांत तो आधुनिक शोधाचे महत्त्व मानतो. त्याचे शास्त्र व त्याचा धर्म (विवेक आणि विश्वास) यांच्यामध्ये विरोध निर्माण होत नाही. अथवा ही दोन्ही एकमेकांपासून फटकून वागत नाहीत. ब्राह्मांच्या जाणिवेचा मुख्य उगम आणि आधार हा चैतन्यच असतो; त्यांचे मन नव्हे. धर्माच्या बाबतीत भाव आणि भक्ती ही तत्त्वे प्रधान वाटतात. ब्राह्म धर्माचा आणखी एक विशेष सांगताना शिंदे म्हणाले, पूर्ण ब्राह्म व्हावयाचे तर नुसत्या विचाराने किंवा मनोवृत्तीच्या द्वारे होता येणार नाही. प्रथम स्वतःला व नंतर जगाला प्रत्यक्ष सेवा करून आपल्या धर्माची प्रतीती दाखवावयाची असते.

ब्राह्मधर्माच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना ब्राह्म हा आपल्या तत्त्वाशी तडजोड करून कर्मठ लोकांशी जुळवून घेण्याची भूमिका पत्करीत नाही. मूर्तिपूजा आणि विधीचे अवडंबर ह्याचे दुर्भेद्य कवच फोडून आत अडकून राहिलेले धर्मबीज मोकळे करण्याचा त्याचा प्रयत्न अखंडपणे सदैव चालू असतो. मात्र स्वतःच्या मताचा दुस-यावर जुलूम किंवा आग्रह करण्याचा ब्राह्माचा प्रयत्न नसतो. जड शास्त्रांचा अतिशयित नकार आणि धर्मशास्त्रांचा अतिशयित होकार ह्या दोहोंचा अढथळा धर्ममार्गात सारखाच येतो हे ब्राह्म ओळखून असतो. ब्राह्म हा जखडबंद पंथ नाही. ब्राह्मसमाजाची द्वारे सर्वांना सर्व काळ खुली असतात.

हिंदुस्थानात शंभराहून अधिक समाज आहेत हे सांगून ब्राह्मसमाजाचे कार्य कसे चालते याची त्यांनी माहिती दिली. ब्राह्मसमाजात धंदेवाईक पुरोहित नसतात. समाजातील प्रमुख गृहस्थ उपासना चालवितात. जातिभेद नाहीसा करणे, स्त्रीशिक्षण वाढविणे, बालविवाह बंद करणे, विधवाविवाहाची आडकाठी काढणे ह्या सामाजिक सुधारणांचा ब्राह्ममंडळी नेटाने पुरस्कार करतात. अशा प्रकारे माहिती सांगून व विवेचन करून ब्राह्मधर्माचे स्वरूप त्यांनी विशद केले. निबंध केवळ नुसताच न वाचता त्यामध्ये ते अधूनमधून भर घालीत होते. ब्राह्ममंदिर कसे असते, तेथील वेदी कशी असते इत्यादी माहितीही त्यांनी विवेचनाच्या ओघात सांगितली.

त्यानंतर शिंदे यांनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी ह्या अन्य दोन उदार धर्मपंथांचा परिचय करून दिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये आर्यसमाजाची स्थापना केली. चार वेदांचे प्रामाण्य ही एक बाब वगळली तर मूर्तिपूजेचा निषेध, ईश्वराचे एकत्व व शुद्ध स्वरूप आणि सामाजिक सुधारणेची सर्व अंगे ह्या बाबतीत ब्राह्माइतकीच जोरदार व प्रांजळ भूमिका ते घेतात.

पंचवीस वर्षांच्या अल्पशा अवधीत विचार, संघटना आणि प्रचार या बाबतीत आर्यसमाजाने आश्चर्यकारक प्रगती केली असून हल्ली दोनशे पन्नास आर्यसमाज आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

हिंदुस्थानातील तिसरा उदार धर्मपंथ म्हणजे थिऑसॉफिकल सोसायटी. अमेरिकेत उगम पावलेल्या या चळवळीचे हिंदुस्थान हे मुख्य ठाणे झाले आहे. अनेक धर्मातील मंडळींनी ह्या चळवळीत प्रवेश केला आहे. या पंथातील गूढवादाच भाग वगळल्यास काशी येथील सेंट्रल हिंदू कॉलेज, मद्रासमधील पारिया ह्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील मुलांकरिता काढलेल्या शाळा हे त्यांचे प्रयत्न आदरणीय आहेत, असे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील ह्या तिन्ही चळवळींपैकी ब्राह्मसमाजाची दिशा प्रस्तुत युनिटेरियन महासभेच्या धोरणाला अगदी अनुकूल वाटते असा अभिप्राय शिंदे यांनी प्रकट केला. पुढील काळात हिंदुस्थानातील अन्य दोन्ही चळवळींशी आमचे ऐक्य होईल अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. भावी काळामध्ये होणारे युद्ध हे अमुक वाद व तमुक धर्म यांमध्ये नसून एकापक्षी सर्व जुन्या धर्माची शुष्क हाडे व दुस-यापक्षी धर्माचे रसभरित व उचंबळणारे जीवन यांमध्ये होणार आहे आणि प्रस्तुत महासभा (कौन्सिल) ही आगामी युगाची मोठी पताका आहे, असा विश्वास व्याख्यानाच्या अखेरीस त्यांनी प्रकट केला. सर्व उदार धर्म परस्परांच्या जवळ यावेत व समान उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्या सर्वांनी प्रगती साधावी ही कळकळच त्यांच्या बोलण्यातून प्रकट झाली.

ही परिषद अत्यंत यशस्वी झाली या प्रकाराचे अभिप्राय सर्वच युनिटेरियन वृत्तपत्रांनी नमूद केले. दि इन्क्वायररच्या संपादकांनी “उदार धर्मविचाराच्या मंडळींना परिषदेमुळे प्रोत्साहन मिळाले. धर्मविषयक प्रश्नांना काहीएक नवी अंतर्दृष्टी मिळाली” असा स्वतःचा अभिप्राय नमूद केला. प्रो. जाँ रेव्हील यांनी ला प्रोतस्तंत ह्या वृत्तपत्रात परिषदेचे फलित नमूद केले. “परिषदेचे उद्दिष्ट कुणा एका पंथाचे हित बघणे नव्हे तर सर्व उदार पंथांना नैतिक आणि धार्मिक तत्त्वांच्या अनुरोधाने एकत्र आणणे हे असून कर्मठ धर्ममताच्या असहिष्णुतेच्या विरोधात उभे राहण्याचा आत्मविश्वास तिने निर्माण केला.”३ डॉ. एच्. एच्. वुर्ट यांनी लिहिलेल्या लेखमालेच्या अखेरीस “अनेक विद्वानांत मतभेद दिसून आला तरी एकोप्याला बाधा आली नाही. सत्याची आणि बंधुत्वाची भावना अनुभवाला येत होती” असे मत प्रकट केले.४ डी हरव्होर्मिंगच्या संपादकांनी म्हटले, “जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले प्रतिनिधी पाहता उदार धर्मजीवनाचा प्रवाह किती बळकट आहे याची जाणीव झाली.”५

कर्मठ धर्ममताच्या मंडळींकडून या परिषदेवर टीका होणे हेही स्वाभाविक होते. दि तीज् (De Tijd) हे ऍमस्टरडॅम येथील त्या वेळचे कॅथॉलिक वृत्तपत्र उदारमतवादी आणि लोकशाहीवादी विचारांच्या विरोधात होते. २ सप्टेंबर १९०३च्या अंकामध्ये ‘बरळणा-या जिव्हा’ (Bebel of tongues) या शीर्षकाचा प्रतिकूल लेख लिहिलेला असून लेखाच्या अखेरीस म्हटले आहे, “येथे जी व्याख्याने झाली ती एक प्रकारची बरळ होती. सर्व ख्रिश्चन श्रद्धा ह्या बांधून ठेवणा-या अंधःश्रद्धा आहेत म्हणून फेकून देणे, सर्व सनातन परंपरांवर भ्रमाचे जंजाळ म्हणून शिक्का मारणे, श्रद्धेची परिभाषा ही रास्त विश्वासाला नष्ट करणारी आहे असे समजून तिचा तिरस्कार करणे, कोणत्याही श्रद्धेशिवाय ख्रिश्चॅनिटीची शिकवण देणे आणि परंपरा मान्य न करता फक्त ख्रिश्चन हे नाव तेवढे पत्करणे ह्यामुळे हे आधुनिक धर्मवेत्तेदेखील अडचणीत येतात ह्यात नवल ते काय. अनेक प्रकारच्या विसंगती ह्या सत्य म्हणून कशा बरे पत्करता येतील? ख्रिस्ताचे दैवीपण नाकारणे; ख्रिस्ती धर्माची उलथापालथ करणे; ख्रिस्ती धर्मकल्पना समाजातून आणि लोकांच्या अंतःकरणातून हद्दपार करणे आणि तरीही ख्रिश्चन म्हणवून घेणे हा दिशाभूल करणारा दांभिकपणाच नव्हे काय? ह्या वृत्तपत्राच्या पुढील ३ व ५ सप्टेंबरच्या अंकांतही परिषदेवर टीका असली तरी तिचा चांगला वाटणारा भागही त्यांनी मान्य केला आहे. ५ सप्टेंबरच्या अंकात, “हे सगळे असले तरी त्यामध्ये आपल्या हृदयाला आणि आत्म्याला हात घालणारा असा काही भाग आहे. शेकडो विद्वान जमलेले असताना दैवीपणाबद्दल जरी आदर दाखविला नाही तरी ख्रिश्चन धर्मामध्ये असलेल्या अतिमानवी श्रेष्ठतेसाठी ख्रिश्चन ही संज्ञा वापरणे यात त्यांच्या आदराच्या भावनेचा पुरावा मिळतो. अश्रद्धेला आणि अश्रद्ध माणसांना ते थारा देत नाहीत आणि ढोबळ भौतिकवाद्यांना अशास्त्रीय असे जाहीर प्रमाणपत्र देतात ही समाधानाची बाब आहे.” लेखाच्या अखेरीस मात्र संपादकाने शापवाणीच उद्गारली. त्यांनी ह्या युनिटेरियन लोकांबद्दल म्हटले आहे, “ह्या दुराग्रही लोकांबद्दल परमेश्वर दैवी न्याय करीलच. सामान्य, नम्र आणि साध्या माणसांना परमेश्वर जे प्रकट करील ते या दुराग्रही लोकांपासून मात्र लपवून ठेवील.”६

कर्मठ धर्ममताचा कडवेपणा कसा प्रकट होतो हे शिंदे यांना या परिषदेच्या निमित्ताने चांगलेच ध्यानात आले असणार.

डी हरहोर्मिंगच्या १२ सप्टेंबर १९०३च्या अंकात परिषदेचे अध्यक्ष प्रो. वुर्ट यांचा संपूर्ण परिषदेचे सिंहावलोकन करणारा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. ह्या लेखामध्ये परिषदेतील कोणते प्रसंग विशेषत्वाने अधिक ठसले याचे त्यांनी काव्यमय निवेदन केले आहे. ह्यामध्ये शिंदे यांच्या प्रभावी भाषणाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. ते म्हणतात, “प्रो. फ्लेडरर हे हारलेम्स स्ट्रीटवरील परिषदेच्या सभागृहात ज्या वेळेला पटवून देत होते की, हारनॅक यांचे मूळ ख्रिश्चन धर्माचे विश्लेषण किती दूरदर्शीपणाचे होते, त्या वेळचा त्यांचा जर्मन ठसक्याचा आवाज माझ्या कानात अजूनही घुमत आहे. रेखीव चेहरेपट्टीचा, मजेदार फेटा बांधलेला सुसंस्कृत हिंदू तरुण माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा उभा राहतो आणि तो ज्या वेळेला आपल्या देशामध्ये धार्मिक उपासना कशा चालतात; बायबल, वेद, कुराण यांसारखे धर्मग्रंथ व्यासपीठावर कसे असतात, तसेच तेथे क्रूस, चंद्र आणि विष्णूचे प्रतीक कसे असते व ते एकाच अनंतत्वाच्या वर्तुळामध्ये एकात्म कसे होतात ह्याबद्दल सांगत होता, त्या वेळचा त्याचा आवाज मला पुन्हा ऐकू येत आहे.”७

ऍमस्टरडॅमच्या परिषदेत अनेक मान्यवर निष्ठावंत, विद्वान युनिटरियन बोलले. त्यामध्ये शिंदे यांचे गुरू जे. ई. कार्पेंटर होते. पॅरिसमध्ये शिंदे ज्यांना आवर्जून भेटले ते प्रो. जाँ रेव्हील होते. लिव्हरपूल येथील डॉ. आर. के. आर्मस्ट्राँग, बेल्जियमचे जेम्स होकार्ट, बोस्टनचे डॉ. एस. के. इलियट आणि ऍमस्टरडॅमचे प्रो. एस. क्रॅमर, प्रो. ए. ग्रोनिंग इत्यादी ज्येष्ठ विचारवंत, धर्मनिष्ठ मंडळी होती. त्यांच्यासमवेत बोलण्याची, आपले विचार मांडण्याची संधी विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली आणि विशेषतः अलीकडील दोन वर्षांत त्यांनी हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम इत्यादी पारंपारिक धर्माचा आणि युरोपमधील युनिटेरियन व भारतातील ब्राह्मसमाज, आर्यसमाज, थिऑसॉफी इत्यादी सुधारक धर्मपंथांचा जो व्यासंग केला होता, जे चिंतन केले होते ते त्यांनी आपल्या भाषणातून प्रगल्भपणे, स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडले. शिंदे यांचा निबंध, त्यांनी दिलेले व्याख्यान व त्यांचा परिषदेतील वावर ह्या सा-याच गोष्टी प्रभावी ठरल्या असे वृत्तपत्रांत आलेल्या त्यांच्या भाषणाच्या सविस्तर वृत्तान्तावरून तसेच परिषदेचे अध्यष प्रो. वुर्ट यांनी त्यांच्यासंबंधी जो खास उल्लेख केला त्यावरूनही दिसून येते.

ह्या आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ब्राह्मसमाजाने विठ्ठल रामजी शिंदे यांची जी निवड केली होती ती सर्वथैव योग्य होती याचा प्रत्यय शिंदे यांनी दिला.८
संदर्भ
१.    दि इन्क्वायरर, लंडन, १२ सप्टेंबर १९०३.
२.    न्यू रॉटरडॅम करंट, अँमस्टरडॅम, ३ सप्टेंबर १९०३.
३.    दि इन्क्वायरर, लंडन, १९ सप्टेंबर १९०३.
४.    न्यू रॉटरडॅम करंट, अँमस्टरडॅम.
५.    डी हरव्होर्मिग, अँमस्टरडॅम, १२ सप्टेंबर १९०३.
६.    दि तीज्, अँमस्टरडॅम, ५ सप्टेंबर १९०३.
७.    अँमस्टरडॅम येथील तरुण संशोधक व्हॅन ह्यूब वेर्ख (Van Hub Versch) यांनी प्रस्तुत परिषदेचे डच वृत्तपत्रात आलेले सगळे संदर्भ अँमस्टरडॅम येथील त्या त्या वृत्तपत्राच्या कचेरीत प्रस्तुत लेखकास नेऊन दाखविले. तसेच सर्व आवश्यक संदर्भ निवडून त्याचे इंग्रजीत भाषांतर करून प्रस्तुत लेखकास उपलब्ध करून दिले.
८.    विठ्ठल रामजी शिंदे, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १५५-१६०. शिंदे यांच्या भाषणातील अवतरणे व प्रतिपादन त्यांनी स्वतः मराठीत केलेल्या त्यांच्या वरील अनुवादातून घेतले आहे.

अहल्याश्रमाची पूर्व तयारी

विठ्ठल रामजी शिंदे यांनी आरंभिलेले अस्पृश्यतानिवारण्याचे कार्या अशा स्वरूपाचे होते की, समाजातील स्रव थरांकडून साहाय्य मिळण्याची त्याला आवश्यकता होती आणि अण्णासाहेब शिंदे हे तर स्वभावाने स्पष्ट, परखड बोलणारे, आपल्या तत्त्वाखातर कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे, स्वतंत्र बाणा राखणारे पुरुष होते. तसे असले तरी अस्पृश्यतानिवारणाच्या कामी त्यांच्या वृत्ती अतिशय हळुवार होत्या व ह्या कामासाठी त्यांनी सर्व स्तरावरील मिशनच्या कामाच्या संदर्भात त्यांचा राजकीय बाणा कधीच आड आला नाही. आपल्य राजकीय मतप्रणालीचा ह्या कामी अडथळा येणार नाही याची ते दक्षता घेत होते. ह्या कामामध्ये सवर्ण हिंदूंमधील जहाल-मवाळ पुढारी, अस्पृश्य समजल्या जाणा-या भिन्न भिन्न जातींतील पुढारी यांचे साहाय्य घेणे हे जसे त्यांना आवश्यक वाटत होते, त्याचप्रमाणे संस्थानिक, इंग्रज राज्यकर्ते यांचेही साह्म घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी इंग्लंडमध्ये दोन वर्षे वास्तव्य केलेले असल्यामुळे व तेथे चालणा-या सार्वजनिक स्वरूपाच्या कामाचे निरीक्षण केलेले असल्यामुळे येथील इंग्रज अधिका-यांशी कसे वागावे; त्यांचे साहाय्य कसे घ्यावे याबद्दलची रास्त कल्पना त्यांच्या मनामध्ये असणार. म्हणूनच मुलकी आणि लष्करी इंग्रज अधिकारी यांचे साहाय्य ते उत्तम रीतीने घेऊ शकले. ख्रिश्चन धर्माचे हे ब्रिटिश अधिकारी अस्पृश्यतानिवारण्याच्या कामाचे आणि ह्या वर्गाच्या उन्नतीच्या कार्याचे महत्त्व तात्काळ ओळखीत असत. आधीचे गव्हर्नर सर जॉन क्लार्क यांनी आपली मुलगी मिस् व्हायोलेट क्लार्क हिला संगीताचा जलसा करण्याची व त्याद्वारे मिशनला आर्थिक साहाय्य करण्याची अनुमती दिली होती. मिस् व्हायोलेट क्लार्क हिचा जलसा मिशनच्या कार्याला आर्थक साहाय्य मिळवून देण्याच्या दृष्टीने जसा उपक्त ठरला त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गाच्या सहानुभूतीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीनेही तो अतिशय फलदायी ठरला. हा जलसा झाल्यनंतर लगेचच दुदैवाने मिस् व्हायोलेट क्लार्क ह्या प्रेमळ, गुणी तरुणीचा अकाली मृत्यू झाल्यामुळे ह्या अस्पृश्यतानिवारणाच्या कामालाही एक कारुण्याची छटा प्राप्त झाली होती.


विठ्ठल रामजी शिंदे पुण्यास येऊन राहू लागले त्या सुमारास मुंबईच्याच गव्हर्नरपदी लॉर्ड विलिंग्डन ह्यांची नेमणूक झाली. त्यांची पत्नी लेडी विलिंग्डन यांच्या कानावर ख्रिस्तवासी मिस् व्हायोलेट क्लार्क हिची हकिकत गेली असावी. लेडी विलिंग्डन ह्या पुण्यास मुक्कामासाठी आल्यानंतर पुण्यातील मिशनचे काम समक्ष बघण्याची इच्छा त्यांनी मिशनचे सेक्रेटरी या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे यांना कळवली. त्यानुसार त्यांनी लेडी विलिंग्डन यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला.


शिंदे यांनी मिशनची एक जाहीर सभा बोलाविली. मोठा शामियाना घातला. अस्पृश्य बायकामुले व ह्या कार्यला मदत करणा-या गावातील प्रतिष्ठित स्त्रिया यांनाही बोलाविले. ठरल्या वेळी लेडी विलिंग्डन सभास्थानी आल्या. जमलेला मोठा स्त्री-पुरुषांचा मिश्र समाज पाहून त्यांना आनंद झाला तसेच आश्चर्य वाटले. शाळेची टापटीप, प्रसन्नमुख विद्यार्थी, तालासुरावर त्यांची झालेली कवायत लेडी विलिंग्डनना चित्तवेधक वाटली. पुणे शाखेच्या शाळेतील मुलांना कवायती शिकविण्यासाठी अस्पृश्यवर्गातील लष्करी पेन्शनर मिळत असत. ह्या मुलांची कवायत मोठी चित्तवेधक ठरत असे. मुलांची कवायत बघून प्रभावित झाल्यामुळे लेडी विलिंग्डन अण्णासाहेब शिंदे यांच्या कानात विनोदाने म्हणाल्या,”मिस्ट शिंदे, हे गरीब लोक पुढे एकेकाळी हिंदुस्थानचे राजे होतील.” तितक्याच विनोदाने शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले, “बाईसाहेब, आपला आशीर्वाद खरा होणार यात मला तिळमात्र संदेह वाटत नाही; पण हे लोक राजे झाल्यावर आपण तशरीफ कोठे न्याल?” यावर बाई मनःपूर्व हसल्या. पुढील काळात लॉर्ड विलिंग्डन यांनी मिशनला वेळोवेळी उदार मदत केली आणि मिशनच्या चालकाशी ते सौहार्दपणे वागले याचे हे पूर्वचिन्हच शिंदे यांना वाटले.


पुणे शाखेला स्वतंत्र इमारत असावी, असे शिंदे यांना वाटत होतेच व त्या दृष्टीने १९१२ सालच्या ऑक्टोबरमध्ये व्यापक प्रमाणात मिशनची महाराष्ट्र परिषद त्यांनी आयोजित केली होती. त्याचाच एक परिणाम म्हणून इंदूर संस्थानचे अधिपती श्रीमंत तुकोजीराव होळकर यांच्याकडून वीस हजार रुपयांची रोख देणगी मिळाली हा वृत्तान्त आपण पाहिलेला आहेच. ह्या देणगीतून पुणे शाखेतून ज्या इमारती व्हावयाच्या होत्या त्यांना अहल्याश्रम हे नाव देण्याचे ठरले होते. ह्या इमारतीसाठी जागा शोधण्याच्या प्रयत्नाला विठ्ठल रामजी शिंदे लागले. पुण्याच्या नाना पेठेत त्या वेळेला भोकरवाडी म्हणून अस्पृश्यांची कंगाल वस्ती होती. ही जागा अत्यंत गलिच्छ होती. वस्तीच्या आजूबाजूला दोन फर्लांग मैदानाची उघडी बाजू होती. ते सर्व स्थळ उजाड आणि भयाण दिसत असे. खाचखळगे, काटे एवढेच नव्हे तर जनावरांच्या हाडांचे मोठमोठे सापळे, चिंध्या, मोडके डबे वगैरे ‘कंगालांच्या संपत्ती’ चे हे मैदान उघडे भांडारच होते. जवळच पोलिसांचे ठाणे असले तरी येथील रस्ता कधी दुरुस्त आणि स्वच्छ नसायचा. मेलेल्या प्राण्यांचे आजूबाजूला अवशेष असल्याने भोवतालच्या जुन्या वाढलेल्या वटवक्षावर भयानक पांढ-या गिधाडांचे कळप वस्ती करून होते. प्रसंगी खून मारामा-याही तेथे होत. अशा स्थितीतले सात एकरांचे हे मैदान पुणे शहर म्युनिसिपालटीने संकल्पित अहल्याश्रमासाठी ९९ वर्षांच्या कराराने दोन निरनिराळ्या भाडेपट्ट्याने ही सात एकराची जागा मिशनच्या स्वाधीन केली. प्रथम तारीख २२-५-१९१५ रोजी पहिला पट्टा दोन एकर, तीस गुंठ्यांचा दरसाल एक रुपया भाड्याने करण्यात आला. पुढे ही जागा पुरणार नाही असे वाटल्यावरून उरलेल्या तीन एकर, तेवीस गुंठ्याची जागा तारीख १३-४-१९२२ रोजी घेण्यात आली. म्हणजे एकंदर सात एकराचे हे मैदान ९९ वर्षांच्या कराराने दरसाल दोन रुपये भाड्याने मिशनने पुणे म्युनिसिपालटीकडून घेतले. भाड्याचे हे दोन रुपयो केवळ मालकी हक्कासाठी ठरविण्यात आले होते.१


ही जागा अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी आणि अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करणा-या मिशनसाठी निवडण्याचे अण्णासाहेब शिंदे यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे कारण होते. ही जागा म. जोतीबा फुले यांनी अस्पृश्यवर्गासाठी शाळा चालविण्याच्या हेतूने आपल्या संस्थेसाठी सरकारडून घेतलेली होती. ती पुढे सरकराकडे जाऊन म्युनिसिपालटी स्थापन झाल्यानंतर म्युनिसिपालटीकडे गेली होती. म. जोतीबा फुले यांचेच कार्य चालविण्यासाठी मिशनला ही जागा पाहिजे अशी ऐतिहासिक परंपरा सिद्ध करून दाखविल्यानंतर पुणे शहर म्युनिसिपालटीने एवढी मोठी जागा मिशनला देण्यासाठी आढेवेढे घेतले नाहीत आणि कार्याचे महत्त्व ध्यानात घेऊन सरकारनेही या व्यवहाराला सहज मंजुरी दिली.२


श्रीमंत तुकोजीराव होळकरांकडून वीस हजार रुपयांची आरंभी मिळालेली मोठी देणगी व त्यानंतर पुणे शहर म्युनिसिपालटीकडून मिळालेली एवढी मोठी जागा ह्या क्रमानंतर इमारत बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळविणे हे ओघानेच येत होते. अण्णासाहेब शिंदे यांनी संकल्पित इमारतीचे नकाशे व खर्चाची अंदाजपत्रके वगैरे जोडून सरकारी विद्याखात्याकडे अर्ज पाठविला. १९१३च्या जुलैमध्येच लॉर्ड विलिंग्डन यांच्याकडे एक खास डेप्युटेशन नेण्यात आले. त्यावरून संकल्पित अहल्याश्रमाच्या इमारतीसाठी वीस हजार रुपयांची मदत देण्याचा सरकारी ठरावही झाला. पण पुढे १९१४ साली आकस्मिकपणे महायुद्धाचे संकट ओढवल्यामुळे परिस्थितीत पालट झाला. सरकार इमारतीसाठी लगेच आर्थिक साहाय्य करू शकत नव्हते. म्हणून इमारतीचे बांधकामही पुढे ढकलण्यात आले. मात्र वरील शिष्टमंडळाने मिशनच्या मुंबई, पुणे हुबळी येथील शाखांतील विद्यार्थी वसतिगृहाचो काम कसे चालले आहे व मुंबई आणि पुणे येथे वाडिया ट्रस्टीच्या देणगीतून औद्योगिक शिक्षणाचे काम कसे चालले आहे हे लॉर्ड विलिंग्डन यांना नीट समजावून सांगितले. मिशनच्या कामाचे महत्त्व त्यांना भावले असल्यामुळे त्यांनी मिशनला विशेष सवलतीचे ‘ग्रँट इन एड’ देण्याचे आश्वासन दिले व वसतिगृहाच्या मदतीसाठी दरसाल दोन हजारापर्यंतची मदत युद्धाची अथवा अन्य कोणतीही सबब न सांगता दरसाल करण्याचे मान्य केले व ही मदत सालोसाल पुढे मिळत राहिली.३
 

 

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २७९.
२.    तत्रैव, पृ. २७९.
३.    तत्रैव, पृ. २८०.

अपूर्व स्नेहसंमेलन

अलीकडच्या काळात मधुमेह, कंपवात ह्या व्याधींमुळे अण्णासाहेब फारसे कुठे बाहेर जाऊ शकत नव्हते. वाई ब्राह्मसमाजाच्या मंडळींच्या आग्रहाखातर व कार्याच्या निष्ठेमुळे क्वचित वाईला जाणे होईल तेवढेच. घरी भेटावयास आलेल्या मंडळींबरोबर मात्र ते मोकळेपणाने चर्चा करीत. आवश्यक वाटे तेव्हा सल्ला देत. सातारचे भाऊराव पाटील अण्णासाहेबांकडे अलीकडे वरचेवर येत असत व शैक्षणिक प्रश्नांबाबत त्यांच्याशी विचारविनिमय करीत, त्यांचा सल्ला घेत. वाई ब्राह्मसमाजाच्या फिरतीवर अण्णासाहेबांबरोबर भाऊराव पाटीलही कधी कधी असत आणि वाईच्या परिसरातील खेडयांतील लोकांपुढे आपले विचार मांडीत असत. भाऊरावांच्या मनात अण्णासाहेबांबद्दल मोठी आदराची भावना होती. भाऊराव त्यांना गुरूस्थानी मानीत असत. अण्णासाहेबांनी ज्या अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याला प्रारंभ केला होता त्याची अंमलबजावणी भाऊरावांनी आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केली होती. सातारा येथील त्यांनी सुरू केलेल्या बोर्डिंगांमध्ये अस्पृश्यता पाळली जात नव्हती. स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांचे राहणे-जेवणे एकत्र होत असे व भाऊराव सर्व जातिधर्माच्या मुलांना पित्याच्या वात्सल्याने वागवीत असत. खेडेगावांमध्ये शिक्षणप्रसाराचे भाऊरावांनी चालविलेले काम व अनुषंगाने सुरू ठेवलेला अस्पृश्यतानिवारणाचा उपक्रम अण्णासाहेबांनाही फार मोलाचा वाटायचा आणि भाऊरावांनाही आपल्या कार्याला अण्णासाहेबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद असावेत असे वाटत होते. म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकांना शपथ देण्याचा समारंभ भाऊरावांनी अण्णासाहेबांच्या हस्ते ठेवलेला होता.


१९३७ साली काँग्रेसने मुंबई इलाख्यात अधिकारग्रहण केले व आपले मंत्रिमंडळ स्थापन करून राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. मुंबई सरकारच्या मंत्रिमंडळात ना. बाळासमुख्यमंत्री होते. कॉंग्रेस सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षणक्रमात आमूलाग्र बदल करण्याचे ठरविले व त्याबद्दलची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. शिक्षणविषयक फेररचनेचा भाग म्हणून मुंबई इलाख्यातील १४ सरकारी हायस्कुले लोकांच्या स्वाधीन करण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री बाळासाहेब खेर ह्यांनी केली. खाजगी संस्थांना ही हायस्कुले देण्याच्या बाबतीत घाईने निर्णय करणे हे अण्णासाहेबांना धोक्याचे वाटत होते. ज्या शिक्षणसंस्थांना बहुजन समाजाच्या शिक्षणाबद्दल आस्था नाही अशा शहरी शिक्षणसंस्थांच्या स्वाधीन जर ही हायस्कुले केली तर ही गोष्ट बहुजन समाजाच्या हिताची ठरणार नाही, असेही त्यांना वाटत असावे. कदाचित भाऊराव पाटलांनीही याबाबतीत त्यांच्याशी चर्चा केली असेल. तेव्हा ह्या शिक्षणविषयक धोरणाचा गंभीरपणे विचार व्हावा व राजकीय क्षेत्रातले नेते, मंत्री आणि शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्यामध्ये एकत्र बसून विचारविनिमय व्हावा, स्नेह वृध्दिंगत व्हावा या हेतूने अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी एक स्नेहसंमेलन आयोजित करावयाचे ठरविले. सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन पुण्यासच चालू होते, त्यामुळे मंत्रिमंडळाचे सदस्यही एकत्रितपणे उपलब्ध होण्याची शक्यता होती, म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी कॉंग्रेस सरकारमधील मंत्री, विधिमंडळ चिटणीस तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व विचारवंत अशा सुमारे ५२ मंडळींना ह्या स्नेहसंमेलनासाठी निमंत्रित करावयाचे ठरविले. ह्या स्नेहसंमेलनाच्या येण्याचे निमंत्रणपत्र त्यांनी पाठविले, ते असे :१


स्नेहसंमेलन
काँग्रेसने अधिकार स्वीकार केल्यापासून राजकारणाखेरीज इतर राष्ट्रीय बाबतीतही क्रांती हळूहळू घडत आहे, परंतु त्याप्रमाणे स्नेह व ऐक्य यांचे वर्धन होत नाही. त्यामुळे क्रांतीचा उद्देश कृतीत उतरत नाही. म्हणून हे छोटेसे संमेलन मी माझ्या घरी (रामविहार, जंगली महाराज रोड, भांबुर्डा, पुणे-५) येत्या शनिवारी तारीख १८ सप्टेंबर १९३७ रोजी सायंकाळी बरोबर सहा वाजता बोलाविले आहे. मुंबई इलाख्याचे मंत्रिमंडळापैकी ना. खेर, ना. लठ्ठे, ना. पाटील वगैरेंनी कृपा करून भाग घेण्याचे कबूल केले आहे. संमेलनाचा उद्देश केवळ सामाजिक नसून, राष्ट्रीय शिक्षणाच्या एका महत्त्वाच्या बाबीविषयी जिव्हाळयाची चर्चा करावी हा एक विषय आहे. म्हणून खालील मित्रमंडळींनी वेळेवर हजर राहण्याची तसदी घ्यावी, अशी नम्र विनंती आहे. काहींचा प्रत्यक्ष परिचय नसला तरी कार्याकडे व हेतूकडे पाहून औपचारिकपणा टाकून ते मजवर उपकार करतील या खात्रीने ही विनंती आहे. संमेलनाचे यश वक्तशीर आगमन व मुद्देशीर चर्चा यांवर अवलंबून आहे. कळावे ही विनंती.
रामविहार
भांबुर्डा, पुणे नं. ५
ता. १४ सप्टें. १९३७.


कार्यक्रम
सायंकाळी ६ वाजता -  स्वागत, परिचय वगैरे
सायंकाळी ६ वाजून १५ मि. - बैठक (भाषणे व चर्चा)
सायंकाळी ७ वाजून ३० मि. - चहा.


योजिल्याप्रमाणे हे संमेलन विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या गच्चीवर शनिवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू झाले. उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री ना. बाळासाहेब खेर, ना. आ. बा. लठ्ठे (अर्थमंत्री), ना. ल. मा. पाटील (स्थानिक स्वराज्य मंत्री), ना. मोरारजी देसाई (महसूल मंत्री), अन्य मंडळींपैकी के. ब. देशमुख (संगमनेर), बा. ज. शिंदे (सातारा), रा. कृ. करवडे(सातारा), रा. भा.थोरात(नाशिक), ज. भ. मोरे(पंढरपूर), दा. खा. जगताप(केंजळ, मजूर पक्ष मुंबई), श्रीमती लक्ष्मीबाई गणेश ठुसे, श्री. धनाजीराव चौधरी(जळगाव), श्री. न. भी. मास्तर(मुंबई), भु. मा. नंदा, श्री. भा. म. गुप्ते(विधिमंडळ चिटणीस), मा. पु. पाटील(बेळगांव), ति. रू. नेसवी(धारवाड), सौ. हंसाबेन मेहता(मुंबई), डॉ. जीवदास मेहता(विधिमंडळ चिटणीस) संमेलनासाठी आले होते. इतर प्रतिष्ठित कर्त्या मंडळींपैकी श्री. रघुनाथराव खाडिलकर, बा. ग. जगताप, बाबुराव जेधे, हरिभाऊ वागिरे, सुभेदार घाटगे, स्त्रियांच्या ट्रेनिंग कॉंलेजच्या प्रि. कु. शिंदे, भाऊराव पाटील (सातारा),नारायणराव काजरोळकर (जॉइंट सेक्रेटरी, डी. सी. मिशन सोसायटी ऑफ इंडिया), श्री. सोनागावकर (मुंबई), भाऊसाहेब जाधव, इनामदार (वाघोली), केशवराव बागडे वकील (पुणे), शंकरराव मोरे (पुणे), शं. बा. चव्हाण (पुणे), सौ. नागम्मा पाटील (धारवाड), वसंतराव नायक (धारवाड) ही मंडळी उपस्थित होती. एकंदर सुमारे शंभर माणसांचा समुदाय रामविहारच्या प्रशस्त गच्चीवर जमला होता.


स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी अण्णासाहेबांच्या सून सौ. लक्ष्मीबाई व पुतणी शुभा ह्या दोघींनी ‘ऊठ, जाग मुसाफीर, भोर भयी अब रैन कहां जो सोवत है’ हे पद म्हटले. त्यानंतर अण्णासाहेबांनी प्रास्ताविक भाषण केले. प्रथमतः त्यांनी कामाची गर्दी असतानाही पाहुणे मंडळी वेळेवर आलेली पाहून सर्वांचे आभार मानले. त्यानंतर ते म्हणाले, “वरिष्ठ, दुय्यम शिक्षणाचा सर्व खर्च धनिक लोकांकडून घेऊन प्राथामिक शिक्षणाची तातडीने सोय करणे भाग आहे. महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यापूर्वी सर्व जातीच्या आणि दर्जाच्या लोकांच्या हितसंबंधाचे संरक्षण होईल, अशी खातरजमा देणे आवश्यक आहे. त्याशिवाय मागासलेल्या वर्गाचा ह्या योजनेवर विश्वास बसणार नाही व पाठिंबा मिळणार नाही. इलाख्यातील १४ हायस्कुले लोकांच्या स्वाधीन करण्याची घोषण झाली आहे.


खाजगी संस्थांना ही हायस्कुले देण्याच्या बाबतीत घाई होणे फार धोक्याचे आहे. बहुजन पक्षाच्या प्रतिनिधींची संमती मिळवून त्यांच्या हितानुरूप जे योजना करतील अशांच्या खाजगी संस्थांकडे ही ही हायस्कुले सोपविणे अगत्याचे आहे. युरोपात जर्मनीसारख्या उच्छृंखल राष्ट्रांचे सर्वाधिकारी असलेल्या हिटलरसारख्याने टोटॅलिटेरिअँनिझम म्हणजे प्रजेचे सर्वस्व आपल्या मुठीत आवळण्याचे तत्त्व, प्रस्थ झपाट्याने चालविले आहे. राजकीय, धार्मिक, आर्थिक सर्वच बाबतीत आपण करू ती पूर्व दिशा असे होऊन लोकशाही धुळीस मिळत आहे. अशा वेळी काँग्रेसने शिक्षणाचा काही भाग लोकांकडे सोपविणे हे फार सुचिन्ह आहे. मात्र हा प्रयोग सावधगिरीने व सर्वांकडे लक्ष देऊन केला पाहिजे.” अशा प्रकारचे प्रास्ताविक करून अण्णासाहेब शिंदे यांनी ना. खेर यांना या संबंधीचे काँग्रेसचे धोरण मंडळींपुढे दोन शब्दांत ठेवण्याची विनंती केली. ना. खेर यांनी अत्यंत विनयपूर्वक स्पष्ट शब्दांत आपले विचार मांडले. ते म्हणाले, “आपली सर्व संस्कृती पाश्चात्त्य झोटिंगशाहीच्या विरुद्ध आहे. शिक्षण सुधारण्याच्या बाबतीत काँग्रेस जे प्रत्येक पाऊल टाकेल ते सर्व भिन्न हितसंबंधाची योग्य तजवीज करूनच टाकेल. मराठी भाषेचे एक विद्यापीठ होणे जरुरीचे आहे. हल्लीचे उच्च शिक्षण अगदीच कुचकामी आहे. त्याबाबत दुमत नाही. मुंबई विद्यापीठाला इलाख्याच्या सर्व गरजा भागविणे शक्तीबाहेर झाले आहे. त्यातील उणिवा भरून काढण्यासाठीच ह्या नवीन विद्यापीठाचा प्रयत्न होईल. हायस्कुले खाजगी संस्थांना देण्यात येतील. त्याबाबतीतही सर्व जातीच्या हितसंबंधाची तरतूद करून लायकी पाहूनच सोपविण्यात येतील.” असे स्पष्ट आश्वासन देऊन ना. खेर यांनी आपले भाषण संपविले.


यानंतर म. गांधींच्या गौरवाचे एक सुंदर पद म्हणण्यात आले. त्यानंतर अण्णासाहेबांनी “हिंदभूमीच्या उत्कर्षासाठी झटण्यात या महात्म्याला यश येवो, त्यांची शिष्टमंडळी जी अधिकाररूढ झाली आहेत तिला पूर्ण जबाबदारीची जाणीव राहो, हल्लीच्या कठीण काळी प्रजेच्या सर्व आशा सफळ होवोत” अशी कळकळीची प्रार्थना केली. सर्वांचा अल्पोहार व चहा झाला. चहा आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणात परस्परांशी प्रेमपूर्वक बोलण्यात पार पडला. अण्णासाहेब शिंदे यांचा निरोप घेताना ना. खेर त्यांना म्हणाले, “पदे आणि प्रार्थना ऐकून आपल्यास गहिवर आला आणि नेत्रांतून आसवे गळली.” एकंदर समारंभाला एखाद्या महाउपासनेचे स्वरूप आले, असे सुबोधपत्रिकेने नमूद केले आहे.२


अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल व कार्याबद्दल आदर वाटत असल्यामुळे मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांपासून ते महाराष्ट्रातील दूरदूरपर्यंतची कार्यकर्ती मंडळी ह्या समारंभास आस्थेने उपस्थित राहिली. खेड्यापाड्यांतील लोकांची सर्वांगीण उन्नती, बहुजन समाजातील मुलांचे शिक्षण याबद्दल अण्णासाहेबांना आस्था व काळजी वाटत होती. काँग्रेसच्या स्वकीय राज्यातही बहुजन समाजातील आणि मागासलेल्या वर्गातील मुलांची शिक्षणविषयक तरतूद नीट व्हावी असी सूचनाच आस्थेपोटी ह्या स्नेहसंमेलनात अण्णासाहेबांनी केली व अण्णासाहेबांच्या मनातील आस्था व चिंता लक्षात घेऊन ना. बाळासाहेब खेर यांनी शिक्षणासंबंधीचे निर्णय सगळ्या जातीचे हित लक्षात घेऊन अमलात आणले जातील असे आश्वासनही दिले. अण्णासाहेबांच्या प्रार्थनेत प्रकट झालेली आंतरिक तळमळ ही उपस्थितांच्या अंतःकरणाला भिडलेली असणार. म्हणूनच ना. खेर यांनी अण्णासाहेबांचा निरोप घेताना पदे व प्रार्थना ऐकून आपल्याला गहिवर आला व डोळ्यांतून अश्रू ओघळले असे सांगितले. अण्णासाहेब शिंदे यांचे वार्धक्यातील व व्याधिग्रस्त अवस्थेतील राजकीय, सामाजिक स्वरूपाचे हे अखेरचेच महत्त्वाचे कार्य म्हणता येईल.


अण्णासाहेब शिंदे यांनी आयोजित केलेल्या ह्या स्नेहमेळाव्यामुळे व त्यामधील चर्चेमुळे सरकारी हायस्कुले खाजगी शिक्षणसंस्थांच्या स्वाधीन करण्याच्या प्रश्नाचा खेर मंत्रिमंडळाने पुनर्विचार केला असला पाहिजे. कारण सरकारने जाहीर केलेल्या मनोदयाप्रमाणे हा विचार प्रत्यक्षा अमलात मात्र आला नाही.


संदर्भ
१.    शिंदे यांची कागदपत्रे.
२.    सुबोधपत्रिका, २६ सप्टेंबर १९३७.

अखेरचे दिवस

अण्णासाहेबांची प्रकृती मुळातच कणखर होती, त्यामुळे १८९२ मध्ये पुण्यात आल्यापासून ते आयुष्याच्या पुढील सर्व कार्यकाळात ते अतोनात शारीरिक कष्ट घेऊ शकले. विद्यार्थिदशेमध्ये शिकवणीच्या निमित्ताने, कॉलोजमध्ये जाण्यासाठी, तसेच व्याख्याने ऐकण्याच्या निमित्ताने लांबलांबच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी रोजची कित्येक मैल पायपीट करावी लागे. त्या वेळेला ह्या पायपिटीला दारिद्र्य कारणीभूत होते. १९०३ सालापासून ते मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक झाले. प्रचारकाचे काम करण्यासाठी मुंबईसारख्या अफाट विस्तार पावलेल्या नगरीमध्ये सभासदांच्या घरी अनुष्ठानकर्मे करण्यासाठी अथवा समाजाच्या प्रचारकार्याचा भाग म्हणून व्याख्याने देणे, उपासना चालविणे ह्यासाठीही मुंबई शहरामध्ये दूरदूरच्या ठिकाणी त्यांना जावे लागे. शक्य असेल तर ट्रामने, शक्य नसेल तिथे कित्येक मैल पायीच जावे लागत असे. प्रार्थनासमाजाच्या प्रचारकार्यानिमित्त मुंबईबाहेरील इतर गावी तसेच अन्य प्रांतांमध्ये अण्णासाहेबांना प्रवासदौरे काढावे लागत. दरमहाच्या तुटपुंज्या साठ रुपयाच्या मासिक वेतनातूनच त्यांना आपल्या कुटुंबाचा खर्च भागवावा लागत असे आणि धर्मप्रचारार्थ कराव्या लागणा-या प्रवासाचा खर्चही ह्या तुटपुंज्या वेतनातूनच त्यांना करावा लागत असे. ऑक्टोबर १९०६ पासून डिप्रेस्ड क्लासेस मिशन सुरू केल्यानंतर धर्मप्रचारकार्याच्या जोडीने मिशनचे काम करण्यासाठीही त्यांना सतत प्रवास करावा लागत असे. मिशनच्या कार्यासाठी त्यांना वेगळे वेतन मिळत नसे. आपल्या प्रचारकार्यासाठी कराव्या लागणा-या प्रवासखर्चाचा जास्तीचा भार मिशनवर पडू नये, याची अण्णासाहेब दक्षता घेत असत. मुळातच त्यांचा स्वभाव काटकसरी. ही काटकसर त्यांना लहानपणापासूनच दुसरी सख्खी बहीण असलेल्या दारिद्र्याने शिकविली. सार्वजनिक कार्यासाठी जम केलेल्या पैशाचा विनिमय करताना तर ते अतिशयच काळजी घेत असत. त्यांचे मिशनमधील सहकारी वामनराव सोहोनी यांनी अण्णासाहेब कोणत्या प्रकारे प्रवास करतात हे पाहिले होते. त्यांच्या प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, “रा. विठ्ठलराव येथील काम मजवर सोपवून अस्पृश्यतेच्या कार्याची जागृती करण्यासाठी देशभर दौरे काढीत. ऊन, पाऊस, थंडी, वारा ह्यांना न जुमानता सापडेल तेथे वस्ती करावी, मिळेल ते जाडेभरडे जेवावे, तिस-या वर्गातून-कधी कधी चौथ्या वर्गातून (काठेवाडात)-प्रवासा करावा. अशा प्रकारचे त्यांचे दगदगीचे जीवन होते. त्यांची शरीरयष्टी बळकट व काटक म्हणूनच ते इतक्या प्रचंड गैरसोयी साहू शकले.”१ आयुष्यभर अशा प्रकारचे शारीरिक कष्ट, अनियमितता व विविध प्रकारचे त्रास सहन करावे लागल्याचा परिणाम अण्णासाहेबांच्या शरीरावर उतारवयामध्ये दिसून येणे स्वाभाविक होते. १९३० साली येरवड्याच्या तुरुंगात तीन बोटे नखाजवळ पाळीपाळीने दुखू लागली. दहा दिवस त्यांना हॉस्पिटमध्ये राहावे लागले. त्यानंतर थोडासा आराम पडल्यानंतर रोज काथ्या वळण्याचे काम त्यांना करावे लागत असे. त्यामुळे हाताची बोटे दुखत. तुरुंगात आल्यापासून त्यांचे वजन १५६ पौंडावरून १४४ पौंडावर घसरले. म्हणजे बारा पौंडानी कमी झाले.


अण्णासाहेबांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिण्याच्या कामात ते व्यग्र झाले. कौटुंबिक उपासनामंडळाचे काम चालू होतेच. १९३३ साली श्री. ना. बनहट्टी यांनी नवभारत ग्रंथमालेच्या वतीने अण्णासाहेबांचा ग्रंथही प्रसिद्ध केला. ह्या काळात त्यांच्या हाताची बोटेही गाऊटने सुजू लागली. अंगात ताप वगैरे नसतानाही शीण वाटू लागला. २ जानेवारी १९३५ रोजी डॉ. चिंचणकरांकडे त्यांची लघवी तपासणीसाठी पाठवली. तीत सुमारे शेकडा ८-९ साखर आढली. डॉक्टरांनी मधुमेहाचे निदान केले. त्यांच्या बोटाची जखम भरून येत नव्हती, याचे कारणही त्यांना जडलेली मधुमेहाची व्याधी हे लक्षात आले. ही व्याधी अण्णाना त्यंच्या तुरुंगवासातच जडलेली असणार, तुरुंगातून सुटल्यानंतर ३३-३४ साली तिचे स्वरूप तीव्र झालेले आढळले. गाऊट, मधुमेह ह्या ताकद खच्ची करणा-या व्याधींनी त्यांना गाठले. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे इथपासून त्यांची धडाडीची कामगिरी संपुष्टात आली.


त्यांचे बंधू एकनाथराव पुण्यास आलेले होते. अण्णासाहेबांना डॉक्टरी उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्याचे त्यांनी ठरविले. डॉ. देशमुखांना भेटून अण्णांना किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी योजिले. सुभेदार घाटगे यांना बरोबर घेऊन अण्णासाहेब मुंबईला १२ जानेवारीला गेले. दुस-या दिवशी डॉ. देशमुखांना तपासणी केली. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नव्हती. मात्र इन्शुलिन टोचण्याचा उपाय त्यांनी सुरू केला. मुंबईच्या वास्तव्यात यज्ञेश्वरपंत भांडारकर, गद्रे, जयरामनाना, द्वा. गो. वैद्य, डॉ. काशीबाई नवरंगे, बलभीमराव केसकर इत्यादी मंडळी त्यांना भेटून जात होती. इन्शुलिनच्या उपायाने रक्तातील साखरेचे प्रमाणे योग्य तेवढे झाले. बोटाची जखमही भरून येऊ लागली. मात्र उतारवयात शरीर विकल झाले असताना मधुमेहासारखा रोग अखेरपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. डॉ. देशमुखांनी कोणकोणते अन्न, भाज्या व फळे किती प्रमाणात खावीत ह्याचे तोळ्याच्या वजनात कोष्टक करू दिले. पथ्यपाणी कडकपणे सांभाळणे आवश्यक होते. आपल्यासारख्या दरिद्र्याला ही श्रीमंताघरची व्याधी का व्हावी, असे त्यांनी खेदाने नमूद करून ठेवले.


आजारपणासाठी करावा लागलेल्या मुंबई येथील वास्तव्यकाळात, त्यांनी आपल्या मनात खोलवर दडपून टाकलेले दुःख वर यावे, अशी घटना घडली. नोव्हेंबर १९१० मध्ये अण्णासाहेबांचा प्रार्थनासमाजाशी संबंध संपुष्टात आलेला होता. प्रार्थनासमाजाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत “इतःपर श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रार्थनासमाजाचे प्रचारक मानण्यात येऊ नये” असा एक ओळीचा ठराव मंजूर करण्यात आला होता व तेव्हापासून गेली २५ वर्षे मुंबई प्रार्थनासमाजाने अण्णासाहेब शिंदे यांची कोणतीही दखल घेतली नव्हती. एकदाही उत्सवासाठी, व्याख्यानासाठी वा उपासनेसाठी त्यांना बोलाविले नव्हते. ज्या प्रार्थनासमाजाचे प्रचारक होऊन धर्मकार्य करण्यासाठी अण्णासाहेबांनी आयुष्यभरासाठी फकिरीचे व्रत घेतले होते, त्या प्रार्थनासमाजाने त्यांना दूर लोटले. एक प्रकारे त्यांना प्रार्थनासमाजातून बहिष्कृत केले. अण्णासाहेबांनी पुण्यात वास्तव्य करायला सुरुवात केल्यापासून म्हणजे १९१२ पासून त्यांच्या अस्तित्वाची प्रार्थनासमाजाने दखल घेतली नव्हती. मार्च ३४ पासून मात्र मुंबई प्रार्थनासमाजाच्या धोरणाता एकदम बदल झाला व अण्णासाहेबांच्या सहकार्याची मागणी करावयास त्यांनी प्रारंभ केला. मुंबई समाजाच्या ह्या बदललेल्या सहकार्याच्या धोरणाने अण्णासाहेबांना आनंद होण्यापेक्षा विषाद वाटणे व अंतःकरणातेल दुःख उमाळून येणे जास्त स्वाभाविक होते. १९३५च्या छोट्या रोजनिशीत १७ जानेवारीला केलेल्या नोंदीत त्यांनी आपले अंतरंग प्रकट केले आहे. “माझे व मुंबई प्रार्थनासमाजाचे सहकार्य आज जवळ जवळ २०-२५ वर्षे बंद पडले होते. कारण १. राजकारणी मते, २. मी स्वतंत्र ‘अस्पृश्यांसाठी’ मिशन काढले. ३. माझा स्वतंत्र व सरळ बहाणा, ४. शेवटचे विशेष कारण, माझा तीस वर्षांपूर्वीचा स्पष्ट नवमतवाद. ह्यात हितशत्रू स्नेही म्हणविणा-यांच्या वैयक्तिक कारवाईची भर पडून मी या समाजाला पारखा झालो व छळ सोसला. आता प्रार्थनासमाजाला आपली चूक कळली की काय? त्याने आपले विरोधाचे धोरण पार बदलून माझे सहकार्याविषयी मागणी गेल्या वर्षाच्या त्यांच्या उत्सवापासून (मार्च १९३४) आग्रहाने चालविली आहे.


“नाइलाजाने पुढच्या रविवारी मी मंदिरात उपासना चालविण्याचे कबूल केले. हा माझ्याविरोधी बेइमानीपणा केला. परमेश्वरी कार्यापुढे मी माझ्या अभिमानाची आहुती दिली. अखबरनवीस काय म्हणतील ते म्हणोत. मी मुंबईत तीन आठवडे होतो, तेव्हा समाजातील माझे खाजगी मित्रांनी फारच प्रेमळपणा दाखविला.”२


रोजनिशीतील ह्या नोंदीवरून मुंबई प्रार्थनासमाजाच्या धोरणाने अण्णासाहेबांच्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या होत्या व प्रार्थनासमाजाचे हे निमंत्रण स्वीकारण्याच्या बाबत केवढा अंतःकलह त्यांच्या मनात चालला होता, याची कल्पना येऊ शकते. व्यक्तिगत अहंकारापेक्षा त्यांच्या अंतःकरणात असलेली ईश्वरी कार्याबद्दलची श्रद्धा ही अधिक बलवान ठरली. मुंबई प्रार्थनासमाजाच्या निमंत्रणावरून गिरगाव येथील प्रार्थना मंदिरामध्ये २० जानेवारीला त्यांनी उपासना चालविली. २५ जानेवारी हा ब्राह्मसमाजाच्या माघोत्सवाचा मुख्य दिवस होता. या दिवशीही अण्णासाहेबांनी प्रार्थनासमाज मंदिरात राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, डॉ. भांडारकर यांच्या ग्रंथांतील उतारे वाचले व प्रार्थना केली. रविवारी २७ तारखेला यज्ञेश्वरपंत भांडारकरांनी चालविलेल्या उपासनेस ते उपस्थित राहिले. ३ फेब्रुवारीला विलेपार्ले येथील प्रार्थनासमाजाच्या अनाथालयात अण्णासाहेबांनी साप्ताहिक उपासना चालविली, तर सायंकाळी गिरवागातील मंदिरातील उपासनेस ते हजर राहिले. मुंबई प्रार्थनासमाजानेच जो पडदा टाकून अंतराय निर्माण केला होता, तो पडदा समाजानेच काढून घेतल्यानंतर अण्णासाहेब शिंदे हे समाजाने चालवलेल्या ईश्वरी कार्यामध्ये अशा त-हेने मनापासून सहभागी झाले. ६ फेब्रुवारीस मुंबईहू निघून ते पुण्यास परत आले.


मुंबईच्या मुक्कामात त्यांच्या मनाला समाधान देणारी दुसरी घटना म्हणजे बंधू एकनाथरावांचे बदललेले वर्तन. एकनाथराव हे बर्माशेलमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होते. मधल्या काळात त्यांच्यावर आलेल्या कौटुंबिक आपत्तीमुळे व वर्तनक्रमात काहीसे वाहत गेल्यामुळे ते स्वतःच अण्णासाहेब शिंदे व अन्य कुटुंबीय यांच्यापासून दूर गेले होते. अण्णांना मधुमेहाचा विकार झाल्याचे पाहताच त्यांचे बंधुप्रेम उसळून आले. त्यांनी अण्णांना जानेवारी महिन्यात मुंबईस आपल्याकडे नेले. खर्चाकडे व दिवसरात्र अंगमेहनतीकडे न पाहता त्यांनी अण्णांची शुश्रुषा केली. एक क्षणही ते त्यांना विसंबत नसत. अण्णासाहेबांना एकनाथरावांचे हे बदलेले वर्तन पाहून आनंद तर झालाच, पण आश्चर्यही वाटले. परत पुण्यास निघताना त्यांना हूरहूर वाटू लागली. त्यांच्या मनात आले, “जर तो आम्हांमध्ये गेल्या ३० वर्षात मिसळून असता, तर तो घरदार, मुलेबाळे ह्मत आनंदात राहिला असता.”3 बंधू एकनाथबद्दल त्यांचे मन आनंदाने भरून आले. परंतु ह्या आनंदाला तो, आपणही स्वतः ३०-३५ वर्षं आचवलो, याचा विषादही वाटल्यावाचून राहिला नाही.
येरवड्याच्या तुरुंगात असताना अण्णासाहेबांची प्रकृती जी बिघडली, ती पुन्हा ताळ्यावर काही आली नाही. वय उतरणीला लागले होते. शरीरातील रोगाची प्रतिकारक्षमता कमी झालेली होती व औषधी उपाययोजनेला दाद न देणा-या गाऊट, कंपवात यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव त्यांच्या शरीरात झाला होता व १९३४ सालीच खाली येणा-या प्रकृतिमानाचे कारण मधुमेहासारख्या आजाराने शरीरात ठाणे दिले, हे लक्षात आले होते. शारीरिक विकलतेचा स्वाभाविकपणे परिणाम दिसून येत होता. बहुधा मधुमेहामुळे असेल, ते दिवसातील बराचसा वेळ झोपून काढीत असत. १९३३साली अण्णासाहेब शिंदे वेताळपेठेतील सणसांच्या माडीवर राहत असत. त्यांचे वाईचे स्नेही नारायणराव चव्हाण यांचे चिरंजीव रामचंद्र म्हणजेच रा. ना. चव्हाण हे मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्यासाठी पुण्यात वास्तव्य करून राहिले होते. ते अधूनमधून अण्णासाहेबांच्या घरी जात असत. अण्णासाहेबांचे धाकटे चिरंजीव रवींद्र हे त्यांचे मित्रच होते, त्यांनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे अण्णासाहेबांना शारीरिक थकवा बराच जाणवत असे. मग ते झोपाळ्यावर अथवा खुर्चीवर बसलेले असतील तर तेथून उठून त्यांच्या भल्या मोठ्या पलंगावर जाऊन निजत असत.४


मात्र ह्या शारीरिक विकलतेच्या काळातही त्यांची बौद्धिक स्वरूपाची अथवा धर्मप्रचाराची कामे चालूच होती. सदाशिव पेठेतील इतिहास संशोधन मंडळींच्या बैठकीला ते जात असत. य. रा. दाते यांच्या शब्दकोश मंडळावर सदस्य म्हणूनही ते काम करीत होते. अनेक भारतीय भाषा आणि कन्नडसारखी द्राविड भाषा त्यांना अवगत असल्यामुळे त्यांच्या चर्चेचा व त्यांनी प्रकट केलेल्या मताचा लाभ शब्दकोश मंडळाला होत होता.५ क्वचित वसंत व्याख्यानमालेसारख्या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठीही जात असत. कौटुंबिक उपासना मंडळाचे काम ते निष्ठापूर्वक करीत असत. धर्मकार्य हे त्यांचे जीवितकार्यच होते, त्यामुळे जोपर्यंत शरीरात कार्यशक्ती आहे तोपर्यंत ते कार्य थांबणे शक्य नव्हते. ह्या शारीरिक विकलतेच्या काळातही ते पुण्यातील कौटुंबिक उपासनी मंडळाच्या कार्याला चालना देत होते, मार्गदर्शन करीत होते. पुण्यातील बरीचशी बहुजन समाजातील मंडळी त्यांनी धर्मबंधनाने एकत्र बांधली होती. त्यांच्या कुटुंबांतील बायकामुलांना उन्नत धर्मभावनेची जाणीव करून देण्याचे त्यांचे काम चाललेच होते. ह्या काळातच वाई येथे ब्राह्मसमाजाची स्थापना करण्याची प्रेरणा वाईकर मंडळींना त्यांनी दिली. बहुमोल असा सल्ला ते सतत देत राहिले. वाई येथे ब्राह्मसमाज कार्यप्रवण होईल असेही त्यांनी पाहिले. प्रकृती फारशीर बरी नसतानाही वाई येथील ब्राह्मसमाजाच्या कामानिमित्त प्रवासाची दगदग सोशीत होते. वाईच्या आजूबाजूस असलेल्या भुईंज, केंजळ इत्यादी गावी जाऊन सभा घेऊन, फे-या काढून, उपासना चालवून धर्मप्रचाराचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य ते ब्राह्मसमाजाकडून घडवून आणीत होते.


खरे तर, १९३० नंतर त्यांच्या कौटुंबिक वातावरणात आनंदायक बदल होऊ लागला होता. तो म्हणजे त्यांच्या घरात सुरू झालेले नातवंडांचे आगमन. १९२८ साली त्यांचे थोरले चिरंजीव प्रतापराव यांचा विवाह बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याशी संबंधित असलेल्या कुटुंबातील लक्ष्मीबाईंशी झाला. अण्णासाहेब येरवड्याच्या तुरुंगात असताना प्रतापरावांच्या पहिल्या कन्येचा, उर्मिलेचा, जन्म १९३० साली झाला. त्यानंतर दोन वर्षांनी दमयंती ह्या दुस-या नातीचा व १९३४च्या डिसेंबरात सुजाता ह्या त्यांच्या तिस-या नातीचा जन्म झाला. अण्णासाहेबांना लहान मुलांची अत्यंत आवड. त्यामुळे त्यांना ह्या नातींचा फारच लळा होता. तिस-या नातीच्य जन्माच्या बाराव्या दिवशी नामकरण विधी करून त्यांनी सुजाता हे नाव ठेवले. तिच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी मधुमेहावरील उपचारासाठी ते मुंबईस गेले असताना तिची आठवण त्यांना येत असे. आईसारखीच ती सुंदर असल्याचे त्यांनी छोट्या रोजनिशीत नमूद करून तिचे कौतुक केले आहे, तर दुस-या एका नोंदमध्ये ‘सुजाताचे डोळे मला निववितात’ असे म्हटले आहे. १९३५च्या फेब्रुवारीत मधुमेहावर मुंबईतील डॉ. देशमुखांचा उपचार व सल्ला घेऊन पुण्यास परतल्यानंतर उर्मिला व दमयंती हो दोन नातवंडे त्यांना बिलगली आणि सुजाताला पाहून त्यांना फार आनंद झाला. पुढील काळातही सकाळच्या वेळी ते नातवंडांना बरोबर घेऊन फर्ग्युसनच्या टेकडीवर फिरायला जात. नातवंडांच्या क्रीडांनी त्यांच्या मनाला समाधान होत असे.६


प्रेम करणे हा अण्णासाहेबांच्या स्वभाव होता. घरातील माणसांत ते रमून जात असत. कधी कधी सून लक्ष्मीबाई, बहीण जनाबाई अथवा पत्नी रुक्मिणीबाई यांच्यासमवेत ते पत्ते खेळत. आल्यागेल्याचे स्वागत करण्यातही त्यांना समाधान वाटत असे. वाईचे त्यांचे स्नेही नारायणराव चव्हाण यांचा मुलगा रामचंद्र हा पुण्यस १९३३च्या सुमारास मॅट्रिकच्या अभ्यासासाठी येऊन राहिला होता. त्याला ते रविवारी आपल्या घरी जेवावयास बोलवीत. मिशनमधील विद्यार्थी दौलत जाधव आता कर्ते गृहस्थ झाले होते. तेही एकदा पंगतीला असल्याचे रा. ना. चव्हाणांनी नमूद केले आहे.७ मित्रमंडळींचा राबताही त्यांच्या घरी असे. कर्मवीर भाऊराव पाटील, कोल्हापूरचे गोविंदराव सासने हे अनेकदा त्यांच्या घरी येत असत. सुजाता, दमयंती, उर्मिला ही लहान मुले त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत. कर्मवीर भाऊराव पाटलांचे पाय लहानग्या सुजाताला किती भलेमोठे वाटत असत. गोविंदराव सासने हे लोकविलक्षण वागणारे होते. ते गळ्यामध्ये घड्याळ घालून वावरायचे. तिघेही दाढीवाले. म्हणून सुजाता त्यांना आमचे तीन अण्णा असे म्हणत असे.


ह्या मित्रांचा सहवास अण्णांना मिळणार तो अधूनमधूनच. त्यांच्या सहवासात, एकत्र बोलण्यात मन मोकळं करण्यात त्यांना आनंद वाटणार तो तेवढा भेटीतच.


आजारपणाच्या काळातच १९३५ पासून भांबुर्ड्याला घर बांधण्याच्या दृष्टीने अण्णासाहेबांनी कामाला सुरुवात केली. दोन वर्षांत तेथील ‘रामविहार’ ही वास्तू बांधून झाली व अण्णासाहेब शिंदे गुरुवार पेठेतील भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात आले. लक्ष्मीबाईंची बडोदा येथील शेतजमीन आणि त्यांच्याजवळचे सोनेनाणे विकून जे पैसे आले, ते प्रामुख्याने नवे घर बांधण्यासाठी उपयोगात येऊ शकले. ह्या नव्या वास्तूत अण्णासाहेबांना फार काळ राहण्याचा योग नव्हता व तेथील अखेरचे दिवसही फारसे समाधानाचे गेले असे दिसत नाही. अण्णासाहेबांच्या सार्वजनिक आयुष्यातील अखेरची कामगिरी घडली ती ‘रामविहारा’त १९३७ साली. ही कामगिरी म्हणजे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळाला आणि पुणे, सातारा येथील प्रतिष्ठित राजकीय, सामाजिक कार्यकर्तांना निमंत्रित करून भरविलेले अपूर्व स्नेहसंमेलन.
‘रामविहार’ ह्या वास्तूत अण्णासाहेबांच्या हातून घडलेली साहित्यिक कामगिरी म्हणजे त्यांच्या माझ्या आठवणी व अनुभव ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन पूर्णतेस गेले.

अण्णासाहेबांनी येरवड्याच्या तुरुंगात असताना आपल्या आई-वडिलांच्या बालपणीच्या आठवणीत रमून जावे यासाठी लिहावयास प्रारंभ केला होता. सुमारे छापील पुस्तकांची शंभरेक पाने एवढा मजकूर त्यांना तुरुंगात असतानाच लिहिला होता. अण्णासाहेबांचे दुसरे चिरंजीव रवींद्र हे इंदुरास नोकरी करत होते. १९३९ साली ते रजेवर पुण्यास आले असताना अण्णासाहेबांनी लिहिलेले आठवणींचे हस्तलिखित बाड त्यांच्या नजरेस पडले. अण्णांनी आपले हे आत्मचरित्रपर लेखन पूर्ण करावे अशी तळमळ रवींद्राना लागून राहिली.

अण्णासाहेब वार्धक्याने आणि आजाराने जर्जर झाले होते. मुख्य म्हणजे त्यांच्या मनाची उभारी टिकून राहिली नव्हती. याही अवस्थेत रवींद्रांनी अण्णांकडून हे लेखन पूर्ण करून घेण्याचा निश्चय केला. त्यांनी आपल्या नोकरीतून दीर्घकाळाची बिनपगारी सुटी घेतली. आत्मचरित्रपर लेखनासाठी आवश्यक असणारी सामग्री गोळा करण्याचा प्रयत्न केला. रोजनिशा, वर्तमानपत्रांतील आवश्यक कात्रणे काळाच्या व विषयाच्या अनुरोधाने करून दिली. आवश्यक ती माहिती मिळविण्याच्या दृष्टीने परिचितांकडे हेलपाटे घातले व या आत्मचरित्रपर लेखनाचे निवेदन करण्यासाठी वडिलांचे मन वळविले. अण्णासाहेबांनी तोंडी सांगितलेला मजकूर ते उतरून घेत असत. अशा त-हेने त्यांनी प्रयत्नपूर्वक हे आत्मचरित्रपर लेखन तडीला नेले. अण्णासाहेबांच्या शारीरिक आणि मानसिक विकलतेच्या अवस्थेत रवींद्रांनी त्याची मनधरणी करून त्यांच्याकडून हे जे लेखनकार्य करून घेतले, ही फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल. रवींद्रांनी त्यांचे हे लेखन उपलब्ध करून देऊन भावी पिढ्यांवर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत.


अण्णासाहेबांच्या आयुष्याचा अखेरचा चार-पाच वर्षांचा काळ हा त्यांच्य शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने फार कष्टप्रद गेला. गाऊटचा विकार तर होताच. त्यांची बोटे सुजत असत, वेदना होत असत. त्यातच कंपवाताची भर पडली. त्यांचे दोन्ही हात सदैव थरथर कापत असत. शरीर विकल झाले होते, डोळे मात्र पूर्वीपेक्षाही जास्तच भेदक वाटत असत. जणूकाय मनुष्यजातीचा, मनुष्यस्वभावाचा ते वेध घेत असत. पूर्वीसारखे कुटुंबातील वातावरणही सौख्यापूर्ण राहिले नव्हते. पत्नी रुक्मिणीबाई ह्या आर्थिक ओढगस्तीमुळे असंतुष्ट असत. त्यांच्यातही एकांगीपणा वाढला होता. अण्णासाहेबांना मधुमेहाची व्याधी जडलेली आहे, हे लक्षात येऊनही त्या पाचसहा महिन्यांसाठी जमखंडीला शेताच्या कामाला निघून गेल्या. ही गोष्ट अण्णासाहेबांच्या मनाला लागणे स्वाभाविक होते. सगळ्या थोर पुरुषांच्या चरित्रात एक दुदैवी प्रकार आढळून येतो, तो म्हणजे पिता-पुत्र यांमध्ये निर्माण होणारा विरोध. जे चित्र महात्मा गांधींच्या, लो. टिळकांच्या चरित्रात दिसते तेच अण्णासाहेबांच्या चरित्रातही दिसून येते. अण्णासाहेबांच्या व त्यांच्या मुलांमध्ये या अखेरच्या काळात अंतराय निर्माण झाला. बालपणापासून अखेरपर्यंत अण्णासाहेबांना साथ मिळाली, ती म्हणजे त्यांच्या भगिनी जनाबाईंची. प्रेम करणे हा ज्यांचा स्वभावधर्म होता, त्यांच्या वाट्याला केवळ सामजिक पातळीवरच नव्हे, तर कौटुंबिक पातळीवरही प्रेमाचा हा अभाव आला होता. स्वाभाविकपणे तो त्यांना दुःखसह वाटत होता. त्यांचे मनःस्वास्थ्य अनेकदा बिघडून जात असे. अण्णासाहेब शिंदे यांचे प्रार्थनासमाजातील एक जुने सहकारी व मित्र केरो रावजी भोसले यांचे चिरंजीव अनंत (भाई अ. के. भोसले) हे अण्णासाहेब शिंदे यांच्या घरी कधीमधी जात असत. वेताळपेठेतील त्यांच्या घरी घडलेला एक प्रसंग त्यांनी सांगितला. पंडित मालवीयजी हे अण्णासाहेबांकडे आले होते. अण्णासाहेबांच्या बरोबर ते झोपाळ्यावर बसले होते, त्या दोघांत बोलणे चालले होते. पंडित मालवीयजी  अण्णासाहेबांना म्हणाले, “आय अँम अ डिफीटेड हीरो.” त्यावर अण्णासाहेब उद्गारले, “अ हीरो हॅज टु बी डिफीटेड.”८

अण्णासाहेबांच्या या उद्गारातून त्यांचे मन प्रकट होते असे वाटते. हीरो हा उदात्त ध्येय आपल्यासमेर ठेवतो. ध्येयसिद्धीसाठी अपरंपार कष्ट करीत असतो. परंतु त्या ध्येयाच्या उच्चतेमुळे व खडतरपणामुळे ते ध्येय संपादन होण्याजोगे नसते, असाच भाव अण्णासाहेबांच्या ह्या उद्गगारातून दिसून येतो आणि त्यांचे आत्मचरित्रही त्यांच्या ह्या उद्गारातून प्रकट होते. थोर विभूतीचे विचार व्यावहारिक पातळीवर जगणा-या इतरांना नीटसे कळत नाहीत, त्यांच्या हेतूचे यथार्थ आकलन होत नाही, त्यांचा विपर्यास केला जातो. बहुमानाच्याऐवजी मानहानी त्यांच्या वाट्याला येते. त्यांच्या दृष्टीने सगळ्यात वेदनादायक वाटणारा भाग म्हणजे हेतूचा विपर्यास हा असतो.


अण्णासाहेबांनी त्यांच्या माझ्या आठवणी व अनुभव ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागाला १९४० साली जी प्रस्तावना लिहिली आहे, त्यामध्ये त्यांच्या अंतःकरणातील वेदना प्रकट होते. ह्या प्रस्तावनेत प्रारंभी महाभारताच्या वनपर्वातील २८व्या अध्यायातील श्लोक उदधृत केल आहे, तो असा :

 

मृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम्।
नासाध्यं मृदुना किंचित् तस्मात्तिव्रतरं मृदु।।३२।।
वनपर्व, २८ अध्याय

 

धर्म-द्रौपदी संवादांतील बळी आणि प्रल्हाद ह्यांच्या संवादात प्रल्हाद आपला नातू बळी ह्याला म्हणतो, “मऊपणाने (दयेने) कठिणाला जिंकता येते, मऊपणाने अकठिणाला तर जिंकिता येतेच. मऊपणाला असाध्य असे काहीच नाही. म्हणून मऊ (दया) हे तीक्ष्णाहूनही अधिक तीक्ष्ण होय.”


प्रस्तावनेत अण्णासाहेब पुढे लिहितात, “माझ्या आयुष्याचे सार जर काढावयाचे असेल तर वर महाभारतकारकांनी प्रल्हादाच्या तोंडी जो उदगार घालता आहे, तोच माझ्या अनुभवाचा आहे. महात्मा गांधी यांच्या अहिंसावादाची ही तन्मात्राच होय. असा कठीण अनुभव मला कळू लागल्यापासून निदान माझ्या सार्वजनिक कामात तरी मला पदोपदी आला. ह्यावरून मी स्वभावतः मृदू आहे, असे सांगण्याचा माझा हेतू नाही. जी वस्तुस्थिती नाही ती आहे असे कसे सांगू? तसे मी म्हणेन तर पुढे ज्या आठवणी व अनुभव लिहिले आहेत, ती सर्व असत्यमिश्र आणि म्हणून कवडीमोल ठरतील. माझा जन्मस्वभाव मृदू नसून कठीण होता. दारुण नसला तरी, कठीण होता हे खरे. निदान वरील श्लोकातल्याप्रमाणे मृदू तर नव्हता हे खास. पण माझ्या आयुष्यात, विशेषतः माझ्या प्रौढपणात जी जी कामे केली, सत्याची, धर्माची आणि निर्मळ प्रेमाची म्हणून त्यांची धुरा माझ्या दुर्बल खांद्यावर घेतली, त्यात मला कठीण अनुभव आला. त्यामुळे आता मी पूर्णपणे नाही तरी अंशतः बराच मऊ झालो आहे आणि ह्यात माझ्या सेवेच फळ मला मिळाले असे समजून मी जगतचालकाचाच नव्हे, तर जगाचाही आभारी आहे.”


आयुष्याच्या अखेरच्या काळात अण्णासाहेब शिंदे आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात. त्यांच्या मनाला कोणती वेदना होत होती, हे त्यांनी प्रकट केले आहे. ते म्हणताता, “माझ्या कामात यश मिळाले नाही म्हणून मला कठीण अनुभव आला असे नव्हे. यशाची मला आकांक्षा नव्हती. यशाची मला नीट व्याख्याच करिता येत नाही, तर मी त्याची इच्छा तरी कशी करू? माझ्या कामात माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठी मी घरदारही कमी समजून ती ती कामे करीत होतो, त्यांचाही माझ्यासंबंधी गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधही झाला. हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय. ह्यामुळे माझ्या मनाची शांती ढासळली आणि अकाली बहुतेक स्वीकृत कामातून विराम पावलो. मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामातून मी विराम पावणे शक्यच नाही. कारण मी धर्माचा स्वीकार केला हे खरे नसून धर्मानेच माझा स्वीकार केला अशी माझी समजूत असल्याने ह्या शरीरातून विराम पावेपर्यंत तरी धर्माने मला पछाडले आहेच व पुढेही तो मला अंतरणार नाही, ही मला आशा आहे.”९ आपल्या मनातील ही वेदना प्रकट करीत असताना त्यांची धर्मावर कशी अढळ श्रद्धा होती हेही दिसून आल्यावाचून राहत नाही.


जीवनातील सर्वच अंगांकडे अण्णासाहेब शिंदे उत्क्रांतीच्या किंवा विकासक्रमाच्या भूमिकेतून पाहत असत. धर्मासारखी बाब किंवा एखाद्या व्यक्तीचे मन असो, त्यांचा विकास न्याहाळण्याची त्यांची दृष्टी असे. आयुष्याच्या या अखेरच्या टप्प्यातही ते स्वतःकडे अंतर्मुख होऊन ह्या विकासाच्या दृष्टीने पाहतात. ह्या प्रस्तावनेतच ते पुढे लिहितात, “माझ्या अनुभवातून मी वाचलो आहे व मला निर्वाण जरी नाही, तरी मनाला थोडी बहुत अलीकडे शांती मिळत आहे. कारण मी मृदू होऊ लागलो हेच होय. माझी कामे कठीणपणाने होण्यासारखी नव्हती, पण मी जर प्रथमपासून मृदूपणाने ही सर्व कामे केली असती, तर इतके कठीण अनुभव आले नसते. ते स्वभावदोषामुळे आले. त्या सर्वांतून मी पार पडलो, ह्याचे कारण मी माझ्या कामामुळे मृदुतेचे धडे मला कळत किंबहुना नकळतही शिकलो हे खास. जी मृदुता माझ्यामध्ये स्वभावतः नव्हती, केवळ कामामुळे आली, ती माझ्या आईमध्ये मूर्तिमंत होती आणि तिच्याद्वारे ती मजमध्ये मला नकळत का होईना आली होती. एरवी तिचे धडे मी कामामुळे तरी शिकण्यास कसा पात्र असतो.” आयुष्याच्या अखेरच्या काळात, त्यांनी केलेले आत्मचिंतन व आत्मनिरीक्षण त्यांच्या ठिकाणी असणा-या अपूर्व सत्यनिष्ठेला व विशुद्ध धर्मभावनेला धरून आहे, असे म्हणावे लागेल. त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचाच आविष्कार त्यांच्या ह्या प्रांजळ निवेदनातून होतो. त्यांच्या आयुष्यातील अखेरची दोन-तीन वर्षे तर जास्तच वेदनामय गेली. आयुष्यभर सतत कार्यप्रवण राहिलेल्या कार्यशक्ती शारीरिक विकलतेमुळे जराजर्जर देहामध्ये कुंठित होऊन राहिल्या होत्या. संधिवाताचा वेदनादायक विकार बळावला होता. कंपवाताने दोन्ही हात सदैव कापत असत. शारीरिकदृष्ट्या पूर्ण विकलता आलेली होती. दिवसातील बराचसा वेळ बाहेरच्या खोलीत असलेल्या पलंगावरील बिछान्यावर निजून काढीत. हळूहळू त्यांच्या शरीरातील ताकद कमी होऊ लागली.


अखेरीस २ जानेवारी १९४४ रोजी पहाटेस त्यांचे चैतन्यतत्त्व अति कष्टविलेल्या शरीराला सोडून अनंतात विलीन झाले.

 

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३३४-३३५, श्री. वामनराव सोहोनींचे निवेदन.
२.    शिंदे यांची १९३५ ची छोटी रोजनिशी, १७ जानेवारी १९३५.
३.    तत्रैव, नोंद ता. ६ फेब्रुवारी १९३५.
४.    रा. ना. चव्हाण ‘गुरुवर्य अण्णासाहेब शिंदे’ कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे जन्मशताब्दी स्मृतिग्रंथ, (संपा.)एस्.एस्.भोसले, शिवाजीराव सावंत, कोल्हापूर, १९७४.
५.    शिंदे यांच्या कागदपत्रात काही शब्दांच्या व्युपत्ती लिहिलेली कार्डे आहेत. शिंदे यांची कागदपत्रे.
६.    शिंद यांची नात सौ. सुजाता पवार यांनी सांगितलेली माहिती.
७.    रा. ना. चव्हाण, उपरोक्त.
८.    भाई अ. के. भोसले यांची मुलाखत, सोलापुर, १५ एप्रिल १९९६.
९.    वि. रा. शिंदे, ‘प्रस्तावना’, माझ्या आठवणी व अनुभव, भाग १, वत्सला प्रकाशन, पुणे, १९४०, पृ. ८-९.

हेच आमचे उत्तर*

आमच्याकडे नाशिकच्या एका गृहस्थाचे 'रा. शिंदे व बहिष्कृत समाज' असा मथळा दिलेले एक पत्र आले आहे.  आमच्या नाशिककर बंधूंची व त्यांच्याप्रमाणेच ज्यांचे विचार आहेत त्यांची समजूत करण्याच्या भानगडीत आम्ही पडू इच्छित नाही.  हा वाद केव्हाही मिटण्यासारखा नाही.  कारण आमच्या बंधूंचा दृष्टिकोणच मुळी निराळा आहे, त्याला काय करावयाचे ?  नाहीतर निराश्रित साहाय्यकारक मंडळीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसणाऱ्या जागरूककरांना ज्या गोष्टीविषयी योग्य कल्पना होते त्या गोष्टीविषयी एवढी लांब लांब पत्रे लिहिणाऱ्या व रा. शिंदे ह्यांच्या हेतूंचा सहज विपर्यास करणाऱ्यांना रा. शिंदे यांच्या कार्याचे खरे स्वरूप कळू नये असे थोडेच आहे ?  ह्यासाठी जागरूककार जे तिऱ्हाईत त्यांच्या शब्दांनी आम्ही पुढील उत्तर देतो. - सं. सुबोधपत्रिका

----------------------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, २२ ऑगस्ट १९२०
------------------------------------------------------------------------------

रा. शिंदे यांच्या निराश्रित साहाय्यकारी मिशनावर काही अस्पृश्यवर्गातील व्यक्तींकडून होणाऱ्या टीकेचा पूर्वी एकवार आम्ही निषेध केलाच होता.  पुन्हा त्याच बाबतीत त्याच स्वरूपाच्या आक्षेपांचे पत्र आम्हाकउे आले आहे.  टीकाकाराची मुख्य तक्रार ही की, रा. शिंदे यांनी एवढी मोठी रक्कम विद्यार्थ्यांना साह्य करण्याकडे खर्चण्याऐवजी इमारतीतच का घातली ?  हा पैशाचा अपव्यय नव्हे का ?  यावर पहिले उत्तर हे आहे की, हा अपव्यय नव्हे.  चालू खर्चाइतकीच संस्थेला चिरस्थायित्व येण्यास इमारतीचीही आवश्यकता असते.  दुसरी गोष्ट इंदूरच्या महाराजांनी व सरकारने दिलेली रक्कम इमारतीतच का घातली, हे विचारणारे टीकाकार होण ?  आणि ती दुसरीकडेच खर्चण्यास रा. शिंदे कोठे स्वतंत्र होते ?  देणगी देणाराची इच्छाच जर आपल्या देणगीचा व्यय इमारत बांधण्याकडे व्हावा अशी होती, तर त्या बाबतीत नाहक आक्षेप घेत बसण्यात अर्थ काय ?  आमच्या मते असली टीका सर्वस्वी विघातक व कार्यकर्त्या माणसाच्या मार्गात विघ्ने उपस्थित करणारी आहे.  टीकाकारांना इमारतीसाठी पैसा खर्च होणे अनष्टिच वाटत असेल तर त्यांनी अन्य खर्चासाठी म्हणून धनिकांकडून मिशनला साहाय्य मिळवावे.  त्यांपैकी एक पैदेखील रा. शिंदे इमारतीकडे खर्चणार नाहीत अशी आम्ही टीकाकारास हमी देतो.

  1. स्वाशय निवेदन*
  2. सामाजिक स्थिती
  3. सांप्रदायिक अस्पृश्यता
  4. संपादकीय
  • 125
  • 126
  • 127
  • 128
  • 129
  • 130
  • 131
  • 132
  • 133
  • 134
Page 130 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी