1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

धर्म, समाज आणि परिषद

काही काळापूर्वी धर्म आणि शास्त्र ह्यांमध्ये लढा पडला होता व आता ह्या दोहोंमध्ये समेट झाला आहे असे हल्ली मानण्यात येत आहे. पण ह्या समजुतीत एक प्रकारचा धोका आहे. कारण एक तर हा वरील लढा पडण्याचे पूर्वी धर्माचेच एकछत्री राज्य होते, त्याला आता शास्त्ररूपी जबरदस्त प्रतिस्पर्धी भेटल्यामुळे त्याच्याशी तडजोड करावी लागली आहे, ह्यामुळे धर्माचा एक प्रकारचा पराजयच झाल्याचा भास होत आहे. शिवाय शास्त्र अद्यापि होतकरू आहे व धर्माचे तर दिवस होऊन चुकले आहेत. म्हणून पूर्वीचे पारडे अगदी बदलून पुढे शास्त्राचेच एकछत्री राज्य होईल असा ध्वनी ह्या तडजोडीच्य वादातून निघत आहे. म्हणून समेटाच्या ह्या वरच्यावर गोष्टी सोडून देऊन आपल्याला धर्म आणि शास्त्र ह्यांचे प्रांत कसे भिन्न आहेत ते पाहिले पाहिजे. शास्त्राचा कोणताही प्रांत घ्या तो देश काळाच्या मर्यादांनी आखून टाकिला आहे. प्रकाश घ्या, त्याच्याभोवती अनंत अंध:काराचे अवगुंठन आहे. प्राण घ्या, तो अनंत मृत्यूच्या कोंदणात बसविलेला आहे. यावद्भवमात्र अनंत अभावाने व्याप्त दिसत आहेत. अज्ञानेनावृतं ज्ञातं तेन मुहयंति जंतव:| ह्या पदात वर्णिलेले आकुंचित ज्ञानच शास्त्राचे साधन जी बुद्धी तिचा विषय आहे. तिची शक्ती कितीही ताणली तरी अनंत अमर्याद वस्तूपर्यंत तिची मजल कदापि पोहोचणे शक्य नाही, तेथून तिला अप्राप्य मनसासह परत यावे लागणार. पण मनाची दुसरी जी अपूर्व शक्ती श्रद्धा तिचा मात्र ही अनंत अमर्याद वस्तू होऊ शकते. ह्या दृष्टीने पाहाता धर्माचा प्रांत शास्त्राच्या हल्ल्यापासून त्रिकाळ सुरक्षित आहे हे कळून येईल. धर्माचा हेतू आणि कामगिरी म्हणजे ह्या श्रद्धाशक्तीची नेहमी जोपासना करून तिचा उत्तरोत्तर शुद्ध विकास करणे हा होय. अर्थात ब्राह्मधर्माची तर ह्याहून दुसरी काही कामगिरी नाही.

आता धर्मसंघाची अथवा समाजाची कामगिरी काय ते पाहू. श्रद्धेचा विकास करणे हा जो धर्म ह्या पुरूषार्थाचा हेतू त्याला अनुसरून आजपर्यंत होऊन गेलेल्या किती धर्मसंघांनी किंवा समाजांनी आपली कामगिरी बजावली आहे बरे? शिंप्याच्या दुकानात ज्याप्रमाणे आयते तयार केलेले कपडे विक्रीला ठेवतात त्याप्रमाणे ह्या समाजात आयती मते व आयते आचार ह्यांचा माफक दराने सारखा क्रयविक्रय चाललेला असतो! ब्राह्मधर्माची ज्योत जागती ठेवावयाची असेल तर ब्राह्मसमाजाला हा नुसता दलालीचा धंदा करून चालावयाचे नाही. धर्मसमाजाचे काम आपल्या सभासदांपैकी प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वतंत्र आणि स्वाधीन बनविणे हे आहे. त्याला कसल्याही धर्ममताखाली चिरडून टाकणे किंवा कर्मात कोंडून ठेवणे हे नव्हे. मते आणि आचार ही ख-या श्रद्धेला बहुधा मारक होतात, विरळाच प्रेरक होतात. ह्यावरून समाजाने व्यक्तिसाठी काहीच न करता त्यांना नुसते वा-यावर मोकळे सोडले म्हणजे त्या स्वतंत्र व स्वाधीन होतात सा अर्थ नव्हे. उलट समाजाची सभासदांसंबंधी मोठी जबाबदारी आहे. सभासदाची समाजासंबंधी जबाबदारी म्हणजे वर्गणी, अंगमेहनत आणि आगमन ह्यांत बहुतेक येते. पण समाजात जो अधिकृत वर्ग असतो त्याने सभासदांपुढे नित्य निरनिराळी मते प्रतिपादिली पाहिजेत, नवे नवे सिद्धांत शोधले पाहिजेत, सुंदर विधी आणि संस्कारांची शोभा दाखविली पाहिजे. पण ह्यांतील एकाचाही तिळमात्र आग्रह न केला पाहिजे. ठराविक मतांचा आणि विधींचा एकच साचा-मग ती कसलीही असोत, सभासदांच्या गळ्यात अडकविल्याने समाजाची इतिकर्तव्यता झाली असे निदान ब्राह्मसमाजाने तरी समजून चालावयाचे नाही. भिन्न भिन्न मते आणि प्रचार सभासदांपुढे अशा कुशल रीतीने ठेविले पाहिजेत की, त्यांची योग्य निवड करण्यास त्यांना मदत मिळेल. डॉ. किंग नावाचे अमेरिकन उपदेशक हिंदुस्थानात नुकतेच असे सांगून गेले की, मुलांना वर्तनाची योग्य निवड करता येईल अशी पूर्ण मदत करमे एवढेच काय ते पालकांचे कर्तव्य होय. इतर व्यवहारात अज्ञान मुलाशी पालकांचा जो संबंध आहे तोच धर्मबाबतीत संघांचा साधारण सभासदांशी आहे. ह्यावरून श्रद्धेचा विकास करणे हा धर्माचा उद्देश आहे, असे समजावे. म्हणजे ब्राह्मसमाजाचे मुख्य लक्षण स्वातंत्र्य किंवा व्यक्तित्व हेच होय. त्याशिवाय श्रद्धेची वाढ होत नाही, इतकेच नव्हे तर उलट लयच होतो असे इतिहास पुकारीत आहे.

आता परिषदेची कामगिरी काय आहे ती पाहू या. व्यक्तीला आपले व्यक्तित्व राखता येत नाही. ते वाढविण्याची तर गोष्ट राहो, ह्यासाठी संघाची जरूरी आहे, ही गोष्ट सकृतदर्शनी चमत्कारिक दिसते, पण खरा प्रकार असाच आहे. संघ जर आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावील तरच व्यक्तीचा विकास सुरळीतपणे होईल. पण जशी व्यक्तीला संघाची जरूरी तशीच संघाला परिषदेची आहे. एकाद्य ठिकाणचा समाज कितीही मोठा व चांगला असला तरी त्यालाही व्यक्तीप्रमाणे मर्यादा व उपाधी आहेतच व त्यामुळे त्याच्या कर्तव्यशक्तीला आळा पडतो व धर्माच्या अनंत उन्नतीला बाधा येते. म्हणून ठिकठिकाणचे समाज निदान आपल्या प्रतिनिधींच्या द्वारा नियमित काळी एकत्र व्हावेत हे जरूर आहे व स्वाभाविकही आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माच्या इतिहासात वेळोवेली परिषदा भरल्या आहेत. पण आमच्या ठिकठिकाणच्या ब्राह्म व प्रार्थना समाजांमध्ये ही भावना अद्यापि व्हावी तशी मुळीच रूढ झाली नाही.*

असो. धर्म, समाज आणि परिषद ह्यांचे उद्देश अनुक्रमे श्रद्धा, स्वातंत्र्य आणि सहकार्य वाढविणे हे होते.

धर्म आणि व्यवहार

केसी दिसो बरी| आम्ही आळविता हरि||१||
तुका म्हणे देवा-ऐसी झालो करिता सेवा||२||

सर्व विश्वातील व्यवहाराची मूळशक्ती जो परमेश्वर त्याला आळविल्याने म्हणजे त्याच्या धोरणाकडे लय लावल्याने आम्ही कशी उत्तम दिसू? फार काय पण, त्या शक्तीची सेवा करू तर-म्हणजे तिला अनुसरून आपले सर्व लहानसहान व्यवहार करू तर—आमच्यातील जी लहानशी प्राणशक्ती आहे ती ‘देवा-ऐशी’ म्हणजे त्या विश्वशक्तीप्रमाणेच मंगलकारक आणि समर्थ होईल? हा तुकारामांचा उद्गार आहे. तो आम्हांला किती पटतो ते पाहू.

वेळोवेळी आमच्या मनामध्ये उचंबळणा-या धार्मिक प्रवृत्ती आणि संसारामध्ये आमच्या हातून नित्यश: घडणारे व्यवहार ह्या दोन गोष्टी परस्परांपासून अगदी स्वतंत्र राखाव्या किंवा त्यांची भेसळ होऊ द्यावी ह्याविषयी पुष्कळांचा बराच मतभेद होतो. एक पक्ष म्हणतो आम्ही आपल्या धार्मिक प्रवृत्तींचा विकास स्वतंत्रपणे करून घ्यावा हे बरे. आपल्या धर्मसमजुती आम्ही आपल्याशीच ठेवाव्या फार तर आपल्या खासगी वर्तनाशी त्यांचा संबंध आणावा. पण आपल्या सार्वजनिक वर्तनाशी व कर्तव्याशी त्यांचा संबंध आणणे हे फार धोक्याचे व चुकीचे आहे. राजकारण, समाजबंधन, उद्योग,व्यापार, लोकशिक्षण इत्यादी मनुष्यांच्या सार्वजनिक व्यवहारांचे सुधारलेल्या देशांतून झपाट्याने बदलत चाललेले धोरण पाहिले असता सहज एक गोष्ट बिनचूक लक्षात येते, ती ही की, ह्या सर्व व्यवहारातून धर्मसंस्थांचा संबंध आणि धर्म समजुतींचा पगडा एकसारखा कमी कमी होत आहे. हा घटस्फोट कोठे कोठे जुलूमजबरीने, कोठे कोठे हाशीखुषीने तर कोठे कोठे अगदी नकळत आपोआप स्वाभाविक कारणांनीच होत चालला आहे. ह्यावरून हा पक्ष म्हणतो की, धर्मसंस्थांची आणि इतर संस्थांची फारकत होणे हेच इष्ट आणि अवश्य आहे. दुसरा पक्ष म्हणतो की, ह्या दोहोंमध्ये सांगड असावी. ह्या दोन्ही मतांचा इतिहास थोडक्यात असा आहे. धर्माच्या बाह्य आचारांचे प्राबल्य संसारातील सर्व व्यवहारावर वाजवीपेक्षा जास्त वाढून संसारात वेळोवेळी हरकती येऊ लागल्या आणि त्याची प्रगती खुंटली, ह्यामुळे वरील पहिला पक्ष अस्तित्वात आला. पण त्याचा अतिरेक दिसू लागल्यामुळे तडजोड करण्यासाठी हा दुसरा पक्ष उत्पन्न झाला. परंतु वस्तुत: पाहता धर्म आणइ व्यवहार ही स्वतंत्र ठेवावीत किंवा त्यांची सांगड घालावी असे म्हणणा-या दोहों पक्षांसही ह्या दोहींचा अर्थ नीट कळला नाही असे दिसते. ह्या दोहींची सांगड घालावयाची असे म्हणण्यामध्येही, ही दोन्ही स्वतंत्र ठेवावी असे म्हणण्याप्रमाणेच, ही दोन्ही परस्पर भिन्न आहेत, असा ध्वनी निघतो. ही दोन्ही तर मुळीच भिन्न नाहीत. जसे, निरनिराळ्या भोपळ्यांची त्यांना दोरीने एकत्र करून सांगड न घालता पोहणारा त्यांना घेऊन पोहू लागला तर ओघाबरोबर ते चोहीकडे वाहू लागून पोहणारा मध्येच बुडण्याचा संभव आहे, तसे धर्म आणि व्यवहार हे दोन भोपळे निराळे आहेत आणि त्यांना सांगड घालून एकत्र केल्याने आपल्याला सुरळीत पोहता येईल, अशातला प्रकार नाही. असे समजले म्हणजे आपल्या जीवनाची-राजकारण, समाजबंधन, उद्योग, व्यापार आणि लोकशिक्षण ही जशी निरनिराळी खाती आहेत त्यांतच धर्म हे एक वेगळे खाते आहे.

आणि त्यामध्ये काही विशेष जादू आहे, ती जादू त्या खात्याचा निरनिराळ्या खात्यांशी संबंध लावून दिल्याने त्या सर्वांमध्ये शिरून सर्व संसारयंत्र सुरळीत चालेल असे समजणे होय. पण हा भ्रम आहे. धर्म हे निराळे एक खाते मुळीच नसून व्यवहाराच्या निरनिराळ्या सर्व खात्यांच्या तळाशी, मध्ये आणि शेवटी व्यापून रहाणारी आपल्यामधील ही वृत्ती आहे. शरीरात सर्व अवयवांमध्ये प्राण जसा शिखाग्रापासून नखाग्रापर्यंत व्यापून राहतो—तो जसा एक निराळाच अवयव नाही किंवा त्याचे एक शरीरामध्ये विशिष्ट स्थान नाही-तद्वत आमच्या व्यवहारात सर्वत्र निरंतर व्यापून राहणारी एक वृत्ती आहे. हिचा जसजसा दर्जा आणि जितका जितका जोर असतो तसतसे आमच्या सर्व व्यवहारांचे रंगरूप बदलत जाते.

ही वृत्ती मनुष्याचेच तेवढे सर्व व्यापार व्यापून आहे. मी परवा आमच्या निराश्रित साहाय्यकारी मंडळीची मनमाड येथील शाळा पहावयास गेलो होतो. तेथे प्रात:काळी ईश्वरोपासनेचा प्रसंग आला. मुलांनी शाळेची झोपडी झाडून निटनेटकी केली होती. मध्यभागी एक लहानशी वेदी ठेवून तिच्यावर शुभ्र वस्त्र टाकले होते. झोपडीभोवतालच्या बागेतून रंगीबेरंगी ताजी फुले आणून वेदीवर पसरली होती. आमच्या उपासनेस सुरूवात झाली. माझे लक्ष वेदीवरील फुलांकडे गेले तो तेथे एक कोळी आपले जाळे विणीत होता असे दिसले. आमचे उद्वोधन, स्तवन आणि प्रार्थना संपून उपदेशाची वेळ येईतोपर्यंत कोळ्याने वेदीचा पृष्ठभाग उतरण आणि आसमंतातील भाग ह्यांवर पसरलेल्या सर्व फुलांवरून आपले विस्तीर्ण जाळे पसरून फुलांच्या वासाने येणा-या लहान माशा आणि चिलटे ह्यांची मार्गप्रतीक्षा करीत तो स्वस्थ बसला होता आणि मुले उपदेशाची वाट पहात बसली होती. आता ह्याहून उपदेशाला अधिक योग्य विषय तो कोणता असणार! आम्ही उपासना करीत असताना आमच्यासमोर प्रत्यक्ष आमच्या वेदीवर जाळे पसरणा-या कोळ्याच्या व्यवहाराला जी वृत्ती कारणीभूत झाली होती ती, त्याचा धर्म आणि उद्वोधन, स्तवन आणि प्रार्थना करून ईश्वराकडे लय लावणा-या आमच्या व्यवहाराला कारणीभूत झालेली उच्च वृत्ती ती आमचा धर्म. ह्याप्रमाणे सत्त्वानुसार अधिकाधिक भिन्नभिन्न उन्नत व्यवहाराला कारणीभूत होणारी अधिकाधिक निरनिराळी खोल आणि विकसित वृत्ती असते. हाच धर्माचा आणि व्यवहाराचा अर्थ व त्याचा परस्पर अभेद्य संबंध आहे, हा त्या कोळ्याच्या उदाहरणावरून वस्तुपाठ माझ्याभोवती आतुर होऊन बसलेल्या अर्थिकांना मी दिला.

ह्यावरून मनुष्यप्राण्यामध्ये इतर खालील सर्व प्राण्यांचे प्रतिबिंब प्रसंगवशात दिसून येत आहे. खालपासून वरपर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार तो निरनिराळ्या प्रसंगी करीत असतो. आणि त्या निरनिराळ्या व्यवहारांत त्याची निरनिराळी वृत्ती व्यापून असते. म्हणजे तितके उच्च-नीच धर्म प्रसंगवशात त्याच्यामध्ये वावरत असतात.

पण त्या उच्च-नीच धर्माचे तारतम्य जाणण्याचीही आमच्यामध्ये शक्ती असते. तिच्याद्वारे आमच्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये फरक पडत जाऊन हेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारे अनुसंधान आम्ही कायम राखल्यास शेवटी तुकारामाने म्हटल्याप्रमाणे “देवा-ऐशी झालो” असे आमच्या अनुभवास येईल.

देशभक्ती आणि देवभक्ती

धर्माचे कार्य शिरावर घेऊन आम्ही बाहेर निघतो तेव्हा आम्हांस नानाप्रकारची माणसे भेटतात. आणि त्यांच्याकडून आमच्यावर विविध प्रकारचे व केव्हा केव्हा तर अगदी विलक्षण आक्षेप घेण्यात येत असतात. त्यांपैकी असा एक आक्षेप
ब-याच वेळा अगदी स्पष्टपणे करण्यात आला आहे की, “काय हो तुम्हांला ही दुर्बुद्धी सुचली ! हल्लीचा काळ कोण चणचणीचा, चहूंकडे क्रांती किती झपाट्याने चालली आहे. इतर देश मी पुढे की तू पुढे अशी धूम ठोकीत आहेत, त्यात आमची कशी पिछेहाट होत आहे, अशात तुम्ही काय ह्या हरी भजनाच्या नेभळ्या गोष्टी सांगावयास निघाला आहा ! अहो, ही शांतीच्या वेळची कामे. तळीराम गार असल्यासच हे विचार सुचावेत, पण तुमचा तरी काय इलाज ! बुडत्याचा पाय खोलातच जावयाचा !!” सभाजनहो ! रामाची थोरवी गाण्याकरिता जसे रावणाच्या सामर्थ्याचे बळेच अवडंबर माजवावे, तद्वत केवळ हाणून पाडण्याच्या हेतूनेच मी हा वरील आक्षेप कल्पनेने आपल्यापुढे मांडिलेला आहे असे आपल्यापैकी साहजिक धार्मिक वृत्तीच्या ब-याच जणांना वाटण्याचा संभव आहे, पण तसा प्रकार नसून, खरोखरच असा आक्षेप अनेक वेळां आम्हांवर आला आहे. इतकेच नव्हे, तर तो इतक्या जोराने, उघडपणे व प्रामाणिकपणे आला आहे की, त्यावेळी आम्हांला केवळ नम्र होऊन ह्या आवेशाच्या लाटेला दूर जाऊ द्यावे लागले आहे. आता थोडासा विचार केल्यास दिसून येईल की, धर्माविषयी भलतेच ग्रह करून घेतल्यामुळे हा आक्षेप असा उपस्थित होत आहे. धर्मासंबंधी पहिली गैरसमजूत ही की, धर्म म्हणजे हल्ली जगात जे हजारो परस्परविरोधी पंथ माजले आहेत, त्यांतलाच एक कोणता तरी आपला म्हणून घेतलेला पंथ. इतकेच नव्हे तर त्या पंथात चालू असलेली अनेक बाह्यकर्मे आचार इत्यादी. दुसरी गैरसमजूत मोठा तात्विक विचार करूनही होण्यासारखी आहे ती ही की, धर्म म्हणजे केवळ निवृत्ती, (फुट नोट – सोलापूर येथील रिपन हॉलमध्ये युवराजांच्या सन्मानार्थ ता. ११-१०-१९०५ रोजी झालेल्या रोषणाईच्या वेळी दिलेले व्याख्यान.) जगत् सर्व मिथ्या आहे, आपली इंद्रिये ही भामट्याप्रमाणे आम्हांला फूस लावून भलत्याच मार्गाने ओढीत असतात. शहाण्यांनी ह्यांचा नाद सोडून अगदी स्वस्थ राहण्यास शिकावे, हाच अखेरचा पुरुषार्थ. ह्याप्रकारे व्यवहाराच्या बाजूने शुष्क कर्मठपणाचा व विचाराच्या बाजूने उदासीन निष्क्रियतेचा आरोप धर्मावर झाल्यास वरील विलक्षण आक्षेप निघावा ह्यात नवल ते काय ? कर्मठपणा व निष्क्रियता ह्या दोहोंच्या दरम्यान असणारा, आमच्या सर्वमान्य भगवद्गीतेत ठामपणे प्रतिपादिलेला कर्मयोग म्हणजेच धर्म, असे विरळा समजून येते. आणि हा कर्मयोग काही केवळ ज्ञानाने साधत नाही. आधुनिक शोधांच्या द्वारे विश्वाविषयी कितीही सम्यक् ज्ञान झाले, जड सृष्टीत नियमांचे कसे अबाधित साम्राज्य चालू आहे व तीच नियामक शक्ती जीवनसृष्टीचाही हळूहळू कसा विकास करीत आहे, प्रबुद्ध जीवात्म्यास तीच शक्ती कसे स्वातंत्र्य देते, पुन्हा त्याच स्वातंत्र्याचा बली ह्या विश्वयज्ञात अर्पण करण्यास म्हणजे विश्वातील भौतिक आणि नैतिक नियम हेच विश्वनियंत्याच्या ज्या इच्छा त्यांना केवळ अनुसरूनच जीवांनी आपल्या सर्व इच्छा दाखवाव्यात असाही शेवटी उपदेश अंतःकरणात त्याच आदिशक्तीकडून कसा होतो इत्यादी जरी निर्भ्रांत ज्ञान झाले, तरी वर सांगितलेला कर्मयोग साधत नाही. तो साधावयास ह्या आदिशक्तीचे अधिष्ठान जो ईश्वर त्याचे ठायीच केवळ भक्ती बाणली पाहिजे, म्हणून देवभक्ती हा विषय आजच्या व्याख्यानात येणार आहे.

पण आजचा प्रत्यक्ष प्रसंग काही देवभक्तीचा नव्हे, तर देशभक्तीचा होय. आम्ही जे येथे आज जमलो आहो, ते ईश्वरोपासनेकरिता नव्हे तर आमच्या ऐहिक स्वामीच्या सत्कारार्थ. चोहींकडे प्रकाशाचा लखलखाट करून ही जी आम्ही आरती ओवाळीत आहो ती देवाजीस नव्हे तर आमच्या भावी देशपतीस; अर्थात आमच्या देशकल्याणाची ही आरती आहे. युवराज हा आमच्या अदृश्य देशकल्याणाची दृश्यमूर्ती होय. त्याच्या जिवास अपाय किंवा बुद्धीस भंग झाल्यास आमच्या देशकल्याणास धोका आहे. युवराज जर आमचा देशपती नसता तर तो आला काय गेला काय आम्ही आज येथे मुळीच जमलो नसतो. पण तो आमचा स्वामी असल्याने त्याचा सत्कार करणे ही आमच्या देशाची एक सेवा आहे. तेव्हा अशा शुभप्रसंगी देशसेवेचा उत्तम मार्ग कोणता व त्याचा देशसेवेशी काय संबंध आहे हे पाहणे अत्यंत उचित आहे.

प्रथम हल्ली आपली देशस्थिती कशी आहे ती पहावी. प्लेग, दुष्काळ इत्यादी ज्या आधिभौतिक व आधिदैविक अनिष्ट परंपरा आम्हांवर ओढवत आहेत, तीविषयी येथे विचार करावयास नको. कारण ही अनिष्टे काही कायमची नाहीत. पण आमच्यातील आध्यात्मिक उणीव मात्र आम्ही सतत लक्षात बाळगली पाहिजे. इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका इ. जे पुढारलेले देश आहेत, त्यांच्यात राष्ट्रीय ऐक्य कसे अपूर्व दिसून येत आहे व तेच त्यांच्या सुसंपन्नेचा भक्कम पाया आहे. पण आमचा देश अद्यापि राष्ट्र ह्या नावालाही योग्य झाला नाही. जरी हळूहळू राष्ट्रीयत्व येथे बनत चालले आहे, तरी इतरांच्या मानाने ते फारच अपूर्ण आहे. सुखदुःखाच्या प्रसंगी युरोपातील काही राष्ट्रांचे वर्तन जणू एकाद्या व्यक्तीच्याच वर्तनासारखे एक धोरणाने झालेले माझ्या स्वतःच्या नजरेस आले आहे. प्रसंगास सहाध्याय, सहानुभूती व सहकार्य ही तिन्ही पूर्णपणे त्यांच्यात दिसून येतात. पूर्वी भरतभूमीत नवीन वसाहत करणा-या आर्य राष्ट्रांचीही हीच स्थिती असावी असे दिसते. तैत्तिरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्लीच्या व भृगुवल्लीच्या प्रारंभी व समाप्तीस –
सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु माविद्विषावहै ।।

हे वचन आढळते, ते त्या काळचे ब्रीदवाक्यच असावे असे दिसते. “आम्ही परस्परांचे संरक्षण करू, सहभोजन करू, मिळून वीरश्री संपादू, तेजस्वी असे अध्ययन करू आणि कोणाचाही द्वेष करणार नाही” असा ह्या उदात्त ब्रीदाचा अर्थ आहे. पण हल्ली ह्या ब्रीदाच्या व आमच्यामध्ये जमीनअस्मानाचे अंतर पडले आहे. तर अशा स्थितीत आमचे देशसेवेचे आद्य कर्तव्य म्हणजे राष्ट्रीय ऐक्य वाढविणे हे होय. पुढील सर्व कर्तव्यांचा हा पाया आहे. तो नीट न घातल्यास पुढील इमारत उठणारच नाही, किंवा कदाचित उठल्यास फार वेळ टिकणार नाही.

आता ही गोष्ट किती असामान्य आहे बरे ? एवढ्या मोठ्या देशाचे किंबहुना खंडाचे एकराष्ट्र बनणे व त्याचा एकजीव होणे म्हणजे सर्व मानवी इतिहासातील एक अपूर्व प्रसंग होय. ह्याच देशात नव्हे तर दुसरीकडे कोठेही व कधीही एवढ्या मोठ्या जनसमूहाचा व इतक्या विविध व विचित्र प्रकृतीचा एकजीव झालेला आढळत नाही. तर आपण पूर्वी कधी ह्या राष्ट्रीय दृष्टीने एका उच्च पदावर होतो व आता खाली आलो आहो अशी खोटी समजूत करून घेऊन आहे तोही उत्साह घालविण्याची ही वेळ नव्हे, तर मानवजातीच्या समष्टिजीवनाची एक नवीनच व उच्च पायरी आम्ही भारतीयांनी चढावी अशी नारायणाने योजना रचली आहे, तिला आम्ही आनंदाने व धैर्याने साधनीभूत झाले पाहिजे. ह्या कामी केवळ मानवी बुद्धीचे बळ अपुरे होत आहे. देवभक्तीचाच जोराने उदय झाला पाहिजे. जणू काय एका नवीन धर्माचीच स्थापना झाली पाहिजे. एवढे मोठे देशकार्य जर खरोखरीच व्हावयाचे असेल, तर त्यात ते पुढारी झाले असतील व होणारे असतील त्यांच्यात काही अपूर्व गोष्टींचा संचार व्हावयास पाहिजे. जे देवऋषी ह्या महायज्ञाचे अध्वर्युस्थान पत्करणार असतील त्यांचा –
उंची देवाचे चरण । तेथे झाले अधिष्ठान ।।
येथूनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ।।

असा उदात्त भाव झाला पाहिजे; तरच हा विशाल कर्मयोग सिद्धीस जाणार आहे. एरवी कोत्या दृष्टीच्या व हलक्या वृत्तीच्या माणसांनी कितीही ओरड केली किंवा आपल्याच केवळ बुद्धिसामर्थ्यावर उद्दामपणे अवलंबून राहणा-या शूर पण श्रद्धाशून्य पुरुषांनी, किंवा ज्यांच्या अंतःकरणात आशेचा जिवंत झरा वाहत नसून बाहेरून येणा-या असंख्य विघ्नांना एकाद्या पर्वताप्रमाणे जे पाठ देऊन आहेत, अशा धीर वीरांनी किती जरी बाह्य प्रयत्न केले, तरी ह्या महाराष्ट्राची उभारणी होणे दुरापस्त आहे. देशभक्त होणारांनी देवभक्तच आधी झाले पाहिजे—नव्हे असले पाहिजे.

अशा प्रकारची देशसेवा आमच्या देशपतीलाही मान्य आहे व व्हावयाला पाहिजे. ती न करिता आम्ही जर नुसते आमच्या युवराजासमोर तेलवातीचे दिवे ओवाळिले, तर ही एक अत्यंत ग्राम्य मूर्तिपूजाच होणार आहे. धार्मिक मूर्तिपूजेने आमचे झाले आहे तितके नुकसान पूरे आहे. त्यात राजकीय मूर्तिपूजेची भर घालावयास नको. ह्या प्रकारे आम्ही सर्व भारतवासी एक होऊन एकमनाने, एकदिलाने आणि अनन्य भावाने युवराजास सामोरे जाऊन त्याचे स्वागत करू आणि म्हणू की, हे आर्यपुत्र, तू ईश्वराने पाठविलेला आमचा नायक आहेस; आमचा भूदेव आहेस; तुझ्या छत्राखाली आम्ही सर्व एक झालो आहो; ही आमची एकी तू राख आणि पुढील दैवी कार्यात तूच आमचे नायकत्व पत्कर. चिरायू हो, चिरस्मरणीय हो, तू ज्या सर्व कर्माध्यक्ष ईश्वराचा ऐहिक प्रतिनिधी आहेस त्याचा जयजयकार असो ! तरच ह्या आमच्या स्वामीचे खरे स्वागत. नाही तर केवळ अंधपरंपरा अथवा जुलमाचा रामराम !

दास्यभक्तीची ध्वजा

सर्वव्यापी परमेश्वराचे दास होऊन दास्यभक्तीची ध्वजा धारण करणाराचे साहजिकपणे जगात कसे वर्णन असते, हे मनोहर रीतीने तुकारामांनी एका पद्यामध्ये वर्णिले आहे. महाभारतात धर्म, अर्जुन, कृष्ण ह्यांचे स्वभाव वर्णिले आहेत व त्यांच्याद्वारे पुरूषस्वभावाचे चित्र पुराणकारांनी रेखाटले आहे. त्याचप्रमाणे रामायणात असेच चित्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता व मारूती ह्यांच्याद्वारे उमटविलेले आहे. रामायणात मारूती व महाभारतात भीम ह्यांच्या चित्रांचा आज विचार करून भीम कसा होता सांगितले आहे! तर ओबडधोबड, धट्टाकट्टा, कोणत्याही स्थितीची त्याला पर्वाच नाही. त्याचे सामन्याचे शस्त्र काय तर मोठा दगडाचा सोटा म्हणजे गदा. कोणत्याही गोष्टीचा विधिनिषेध नसावयाचा. लहानसहान अडथळ्याने आपण गडबडतो; पण त्याची त्याला काहीच भीती नाही. आला राग की, मारला शत्रूला एक सोटा नि बसवला त्याला खाली. मारूती भीमापेक्षाही ओबडधोबड, डोंगर, झाडझुडूप ही त्याची आयुधे. पण भीमाचे अंत:करण कसे होते? पांडव कुंतीसह अज्ञातवासात गेले. त्यासमयी एकदा एका गावी त्यांची वस्ती झाली. तेथे बकासूर नामक दैत्य लोकांना पीडा देई. रोज एका मनुष्यप्राण्याचा बळी त्याला दिला तरच तो आणखीन त्रास देत नसे. पांडव ज्यांचे घरी उतरले होते, तिथे एके रात्री हा चिंताग्रस्त वाद निघाला की उद्या बकासुराच्या भक्ष्यस्थानी मुलाने जावे की बायकोने जावे की नव-याने जावे? त्याप्रसंगी भीम वरून जरी रानटी दिसे पण त्याचे अंत:करण कोमल होते. ते कळवळून आले. त्याने कुंतीला विचारले की, मी जाऊ का बकासुराच्या भक्ष्यस्थानी पडायला? हा ब्राह्मणाचा पोर मेला तर मरेना, बकासुर मरेना, गाव मरेना, त्याला काय त्याचे होते? धर्म होता, अर्जुन होता, दुसरे भाऊ होते. पण त्यांच्यामध्ये बारीक विचार नव्हता. राजाचा किंवा गावक-यांचा काही करार असेल अशा विचारांनी ते ग्रासून जायचे. तेही कोमल नव्हते असे नाही. पण भीम खरा कोमल होता. दास्यभक्तीची ध्वजा भीमाने जशी घेतलेली होती, तितकी इतरांनी घेतलेली दिसत नाही. भक्तीने अंगाची कातडी जाड व टणक होती, वज्रदेह बनतो. इतकेच नाही तर अंगाचीही कातडी तशीच टणक बनून कितीक सुया, टाचण्या, खिळे, गोळे आले तरी त्यांना ती पुरून उरते. पण अंत:करण मवाळ मृदुही झाले तरी ह्याला ध्वजा पाहिजे असते. ध्वजेत जय सुचविला जातो. आपण एकदा दास झालो आणि कोणाचे तर विष्णूचे; जो सर्वांत समाविष्ट आहे त्याचे दास झालो म्हणजे मग पुढे जायचेच जायचे. त्यावेळी मग बारीक बारीक विचार, बारीक बारीक अडथळे आले तर त्यांना भिऊन थांबा कशाला? आता तुम्ही म्हणाल, काय हो असेच केले पाहिजे का? तर होय. असेच आहे ते.

कामात एकदा आपण पडलो की, अंग सुया बोचून जाडच होत जाते. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरल्यावर वारा लागणार, उन्ह लागणार, पाऊस लागणार. दास्यभक्तीची ध्वजा घेऊन रानावनात हिंडू लागले तर कातडी नाजूक कशी राहणार? पण हे लक्षात ठेवा की, जी कारणे कातडीला कोमल करतात; तीच कारणे काळजाला कोमल करतात. कातडी मऊ व्हावयाला तितक्याचपरीने मन खरोखर निर्लज्ज व्हावे लागते. जेव्हा कळवळा आला, तेव्हा द्रौपदीची लाज राखण्यास भीम उठत असे. कारण भीम आतून किती कोमल! भीम म्हणजे मुलांसाठी पुराणकारांनी केवळ भेसूर चित्र काढून ठेवलेले नाही. आबालवृद्धांस, स्त्रीपुरूषांस सर्वांनाच भीम सांगत आहे की, अंत:करण कोमल करावयाचे असेल तर कातडी मृदु राहण्याकडे पाहू नका. नारळाची कवठी किती जाड. फुटता फुटत नाही, पण आत मगज किती मऊ, व त्यातले पाणी तर किती गोड!

अशारीतीने दास्यभक्तीची ध्वजा आपण चालवू लागलो म्हणजे वर्तनातून कृत्रिमता जाते. उलटपक्षी मानलेले हक्क, मानलेले अधिकार, आपण निर्माण केलेली कर्तव्ये ह्यातच गुरफटलो तर मन कठीण होते. शेतकरी अंगाने किती टणक कठीण असतो पण त्याचे मन किती कोमल! राग आलेला लवकर विसरतो. पण नागरिक जन आपण बनविलेल्या किल्ल्यात बसलेले असतात. त्यांच्या चालीरीती, त्यांचे मान-अपमान ह्यांची त्यांच्यावर पुटे बसतात. निसर्गात राहणारे लोक धडधाकट होतात व हे नागरिक जन आपल्या शरीराभोवती, घराभोवती, शहराभोवती कोट घालून घेऊन बसलेले. ह्यांचा आत्मा सर्व कुजून सडून गेलेला. ही सर्व वेष्टने झुगारून द्या. लौकिकाची, स्वार्थाची कामे सोडून ज्या आपल्या खरोखरी गरजा असतात त्या भागविण्यास झटावे लागते. तो व्यायाम करा म्हणजे शरीर निरोगी रहाते. आपली सुखे सर्व स्वाभाविक होतात. गरजा कृत्रिम नसतात. म्हणून त्या भागविण्यात वृथा कालव्यय होत नाही व टिकतही नाही. दास्यभक्तीची ध्वजा खांद्यावर मुळीच नसते पण ठेवली तर मोडते.

तेव्हा आपण स्वाभाविक राहणीने राहूया म्हणजे भीमासारखे होऊ. तसे झाले नाही तर दास्यभक्ती आमच्या संगीतातच राहील व ती आपणात लवमात्र येणार नाही.

दान आणि ऋण

आज आमच्या ब्राह्मसमाजाचे एक प्रसारक भाई बलदेव नारायण हे परलोकवासी होऊन सहा वर्षे झाली. हे इराणात प्रचारासाठी गेले असता बगदाद येथे अकस्मात पटकीचा उपद्रव होऊन तेथील तुर्की इस्लाम हॉस्पिटलमध्ये ता. २१ ऑगस्ट सन १९०४ रोजी मरण पावले. ह्यांच्याविषयीचा एक लहानसा सुंदर चरित्रात्मक ग्रंथ कुचबिहारी येथील बाबू गौरीप्रसाद मुजुमदार ह्यांनी नुकताच प्रसिद्ध केला आहे. भाई बलदेव हे आमच्या समाजाच्या नामांकित आणि पुढारी प्रचारकांपैकी एक होते असे नाही, किंबहुना हिंदुस्थानातील कित्येक ब्राह्मांना ह्यांचे नावही माहीत नसेल, तथापि ब्राह्मसमाजामध्ये प्रचारकपणाला जे दोन अत्यावश्यक गुण, म्हणजे स्वतःविषयीच्या वासनांचा पूर्ण संन्यास आणि समाजसेवेविषयी आतुरता हे त्यांच्या अंगी पूर्णपणे वसत होते. भाई बलदेव बहारप्रांती जन्मले. लौकिकात कुलीन शब्दाचा जो अर्थ होतो त्या अर्थाने ह्यांचा जन्म मुळीच कुलीन नव्हता. पण ऋषींचे कुल कधीच पहात बसू नये. धर्म आणि नीती ह्यांची लागवड कडधान्याप्रमाणे केवळ वंशपरंपरेने होत नसते. ह्यांच्या बीजांची वाढ होण्याला भूमीचे सर्वतोपरी अवलंब नको आहे. केवळ नैसर्गिक नियमानुसार जन्मास आलेल्या विभूतीमध्ये सात्विक गुणांचा आणि तेजाचा कळस झाल्याची उदाहरणे उपनिषद काळापासून मुबलक मिळत आहेत. पुराणातही पूज्यपादारविंद विदुर आणि तत्प्रणीत नीती पुष्कळ सापडते. केवळ जातिकुलाभिमानाच्या बाह्य अवडंबराने मनुष्य जेव्हा डोईजड होतो, तेव्हा निसर्ग देव जणू काय आपला सात्विक सूड उगविण्यासाठी आणि धर्मनीतीची स्वतंत्रता स्थापण्यासाठी आपली विशेष अपत्ये निर्माण करून जगास देतो. बलदेव भाईही ह्याच कोटीतले होते. ते स्वतःजरी बहार प्रांतात जन्मले तरी त्यांना दक्षिणेतील मंगळूर येथील समाज इतका आवडला की, त्यांच्या मागे त्यांच्या झोळीत जी काही भिक्षा उरली ती सर्व मंगळूर ब्राह्मसमाजास त्यांनी अर्पण केली आणि तिचा व्यय कानडी भाषेतून ब्राह्मधर्मविषयक पुस्तकांचा (फुट नोट – रविवार ता. २१ ऑगस्ट १९१० रोजी केलेल्या उपदेशाचा सारांश.) प्रसार करण्याकडे व्हावा असे मृत्युपत्रात नमूद करून ठेवले. स्वतः संन्यासी होते तरी पंक्तिप्रपंच न करता सामाजिक मेळे आणि संमेलनेही ह्या भिक्षेतून व्हावीत असे बजावून ते इराणात प्रचारास गेले. आणि तेथेच त्यांनी आपली ऐहिक यात्रा संपविली. ह्याप्रमाणे वर्ण, आश्रम, प्रांत, देश, भाषा, जाती, कुल आणि धर्म ह्या कशाचीच बाधा ब्रह्मतत्त्वास होत नाही, हे त्यांनी आपला जन्म, जिणे, आणि मृत्यू ह्या तिहींच्या द्वारे दाखविले.

भाई बलदेव ह्यांनी समाजकार्यास आपल्या आयुष्याचे जे दान केले त्यात त्यांच्या मनाची एक विशिष्ट प्रकारची वृत्ती होती. तिच्यामुळे त्यांच्या कार्यात यश आले. तिचाच आपण विचार करू. आम्ही पुष्कळ वेळां आपापल्या परी लहानमोठी दाने करीत असतो. पण त्यांची सफलता दानाच्या विषयावर नसून दात्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. दान करताना आपण मोठा उपकार करतो, स्वतःचा त्याग करतो, इत्यादी भ्रामक कल्पनांस आपण बळी पडू नये, ते दान कितीही लहान असो, किंवा मोठे असो, खिशातून काढून टाकलेले एकादे नाणे असो, किंवा आपल्या एकंद आयुष्याचे समर्पण असो, ते करीत असताना आपल्याला असे वाटत असावे की केवळ आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड आपण करीत आहो. आपली सर्व दाने ही मागील ऋणांची फेड असते अशी आपली नित्य समजूत ठेवावी.

आमच्या हिंदू धर्मात ह्या ऋणानुबंधाविषयी चांगली मार्मिक आणि तात्त्विक फोड केलेली आहे :
यज्ञार्थात्कर्मणोsन्यत्र लोकोsयं कर्मबन्धनः ।
तदथै कर्म कौतेय मुक्तसंगः समाचर ।।
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोsस्त्विष्टकामधुक् ।।
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ ।।
इष्टान्भोगन्हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।।
तैर्दत्तानप्रवायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ।।
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्विषैः ।
भुंजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ।।
- भ. गी. अध्याय ३ श्लोक ९ ते १३

वरील श्लोकांचा अर्थ पुराणवादी काहीही करोत आणि प्रस्तुत रूढीमध्ये ह्यांचा प्रचार कसाही असो, आम्हांला वरील वचनाचा इत्यर्थ एवढाच दिसून येतो की, समाजाची वाढ आणि विकास म्हणजे त्यातील व्यक्तींनी परस्पर ऋणामध्ये गुरफटून जाणे हे होय. वरील श्लोकात सांगितलेले देव दूरस्थ आकाशात नसून ते समाजाचेच लहानमोठे घटकावयव असतात. त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती सुस्पष्ट जरी दिसत नाही तरी त्यांच्यामधील परस्पर देवघेवीवर समाजाची सरणी अवलंबून असते. ह्या निराकार समाजदैवतांची संभावना करून आपली शक्त्यनुसार ऋणमुक्तता करून घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, आणि त्या कर्तव्यास जो चुकतो तो ‘स्नेत एव सः’ ह्या वचनाप्रमाणे चोर ठरतो. यद्यपि पिनल कोडाप्रमाणे चोरीची त्याजवर शाबिती झाली नाही तरी त्याहून वरिष्ठ कोडाबरहुकूम त्यावर शाबिती होतेच. हे जे परस्पर ऋणानुबंधनाचे चक्र प्रवर्तित झाले आहे, त्याचे अनुवर्तन जो कोणी करीत नाही त्याचे आयुष्य व्यर्थ असे सोळाव्या श्लोकात सांगितले आहे. म्हणून आम्ही दान करावे इतकेच नव्हे तर ते करीत असताना आम्ही जगावर मोठा उपकार करतो अशी आढ्यतेची भावना न ठेवता मागील ज्ञात किंवा अज्ञात ऋणाची केवळ फेड करतो अशी नम्र भाविक बुद्धी राखली पाहिजे. म्हणूनच उपनिषदे म्हणतात :
“श्रद्धया देयं ।। अश्रद्धयाsदेयं ।। श्रिया देयं ।।
र्हिया देयं ।। मिया देयं ।। संविदा देयं ।।”
- तैतिरीयोपनिषद् ११-३

दान करीत असताना आपल्या मनामध्ये अशी श्रद्धा असावी की, ह्याचा परिणाम चांगला होईलच होईल. आपण देतो ह्याची आपणास पावती मिळेल की नाही, पुकारा होईल की नाही, परिणाम घडेल की नाही, अशा प्रकारच्या अश्रद्धेने दान करू नये. इतकेच नव्हे तर देत असताना आपणास लज्जा वाटावी. हे ऋण आपल्या हातून आतापर्यंत फिटले नाही, तेव्हा आता ह्याचा स्वीकार होईल की नाही म्हणून उलट आपला हात भीतीने कापावा. तसेच आपल्या अंतःकरणात कधीही तळमळ असू नये की, हे आपण देतो ते न देता आपल्याजवळ राहिले तर आपल्या बायकामुलांना संतोष होईल. उलट आपल्या बायकामुलांप्रमाणेच दुस-यास जो संतोष होईल, त्याच्या सहानुभूतीच्या आनंदाने द्यावे, हे स्पष्ट करण्यासाठी “संविदा देय” असे म्हटले आहे. असे न करता आपण मेहेरबाणी करण्याच्या बुद्धीने देऊ लागले तर आपली निराशा होते. केव्हा केव्हा तर ह्याहून दानाचा अधम प्रकार असा घडतो की दान देत असताना आपण दुस-यास ऋणच देतो असे समजून त्याची फेड आपल्यास कधीतरी होईल अशी दुराशा आपल्याला लागलेली असते. अशा रीतीने ऋण देणे म्हणजे आपला सत्यानाश करून घेणे होय. पश्चिम आफ्रिकेतील निग्रो लोकांत प्रचलित असलेल्या भाकड कथांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे, त्यात ह्या संबंधाची एक मार्मिक गोष्ट आहे ती अशी :-

एकदा एका लबाड मनुष्याने आपल्या मित्राजवळ २०० काठ्या उसन्या मागितल्या आणि पुढच्या बाजारी परत करीन असे सांगितले. मात्र त्या दिवशी सकाळी येताना बरोबर भरलेली बंदूक आणावी आणि आपली वाट पहात घरी येऊन बसावे असे बजाविले. लगेच त्या लबाड मनुष्याने आपल्या मित्रमंडळींपैकी एक चित्ता, एक बोकड, एक रानमांजर आणि एक कोंबडा ह्यांच्यापासूनही वरील प्रकारचा करार करून दोन-दोनशे काठ्या उसन्या आणल्या. (काठी हे एक प्रकारचे जंगली नाणे दिसते). बाजाराच्या दिवशी हा लबाड मनुष्य आपल्या बसावयाच्या खोलीत मूठभर दाणे पसरून आपण आतल्या खोलीत दार लावून दडून बसला. ठरल्याप्रमाणे प्रथम कोंबडा जो अर्थात लवकर उठणारा प्राणी तो आला आणि भूक लागल्यामुळे जमिनीवर पडलेले दाणे सहजच वेचून खाऊ लागला. मागून रानमांजर आले. त्याने कोंबड्यास खाल्ले. इतक्यात बोकड आला, त्याने रानमांजरास हुसकावून लावले, इतक्यात चित्ता आला. त्याने बोकडाची न्याहारी केली. मागाहून भरलेली बंदूक घेऊन माणूस आला, आणि स्वसंरक्षणार्थ त्याने चित्त्यावर बंदूक झाडली. आवाज ऐकल्या बरोबर दडून बसलेला तो लबाड मनुष्य बाहेर येऊन आपला मित्र चित्ता ह्याचा खून करणा-याला तो धमकी देऊ लागला. शेवटी आणखी दोनशे काठ्या जास्ती देऊन त्या लबाड मनुष्यापासून त्याने आपली कशीबशी सुटका करून घेतली. तात्पर्य हे की, अशा रीतीने ऋण न देता शक्त्यनुसार प्रत्येकाने दानच केले असते तर आपत्ती टळली असती. ह्याप्रमाणे आम्हीही दान करतेवेळी मनात नीच हेतू धारण केल्यास आमचाही यद्यपि शारीरिक नसल्यास आध्यात्मिक नाश होतोच.

केव्हा केव्हा गोष्टीप्रमाणे म्हणीमध्येही मर्म असते. कानडी भाषेत एक म्हण आहे की, “प्रेतावर केलेला शृंगार नव्हे आणि गावावर केलेला उपकार नव्हे.” सार्वजनिक कल्याणाची चर्चा चालू असलेल्या आधुनिक काळात पुष्कळदा आमची अशी समजूत होऊन चुकते की, गावावरील उपकार, हा सर्वांत मोठा उपकार पण वस्तुतः आध्यात्मिक दृष्टीने पाहू गेल्यास कोणतेही दान लहान असो किंवा मोठे असो, एका व्यक्तीस असो किंवा सर्व जगतास असो, ते नुसती मागील ऋणाची फेड ह्या बुद्धीने करणे उचित आहे. आमचे परलोकवासी भाई बलदेव ह्यांनी नवविद्या भक्तीतील शेवटची भक्ती जी आत्मसमर्पण ती आचरीत असताना आमरण मनाची अशी उन्नत भावना ठेविली की, आपण जे जे करतो ते ते मागील उपकाराची फेड करण्यासाठीच करतो.
माझा सर्व भाव तुमचिया पायी । झालो उतराई देवराया ।।
- तुकाराम

  1. दांभिक देशभक्तांपेक्षा
  2. थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्व
  3. डॉ. भांडारकरांस मानपत्र
  4. डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
Page 26 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी