1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

गुरूवर्य शिंदे सूक्ती-

(१) पाच कमीत कमी अनुष्ठानिक सभासद जेथे असतील, तेथे समाज स्थापन करावा.

(२) उपासना प्रसंगी भजने म्हणताना ती घाईत म्हणू नयेत. सावकाश म्हणावीत म्हणजे पदांचा अर्थ म्हणताना लक्षात येण्यास जास्ती वाव मिळतो. टाळ इत्यादी वाद्यांच्या आवाजात किंवा गायनाचे प्रकारात मूळ पदच श्रोत्यांच्या कानांवर जात नाही.

(३) ज्या समाजाच्या साप्ताहिक ईश्वरोपासना नियमित होतात, त्या समाजाचा वार्षिक उत्सव होऊ शकतो

(४) प्रार्थनेच्या द्वारे आपणास ईश्वराशी समागम व संवाद बराच वेळ करिता आला पाहिजे. प्रार्थना हेच उपासनेचे मुख अंग आहे.

(५) एका तासापेक्षा उपासनेस जास्ती वेळ लावू नये.

(६) ठरलेली वेळ झाली म्हणजे कोणाचीच वाट न पाहता उपासना इत्यादी कार्यक्रम चालू करावा.

(७) ज्या समाजास प्रचारक नाही तो समाजच नाही.

(८) प्रार्थना समाज वाढला नाही याचे कारण, कोणीही उठून व्यासपीठावर बसतो. समाजाचे व्यासपीठावर जबाबदार व अधिकारी इसमाने बसावे. उपासनेपूर्वी पदे ठरवावीत व तयारी करावी. रविवारचा दिवस आध्यात्मिक बाबीसाठी राखून ठेवावा.

(९) उपासनेस पुरूष सभासदाने एकट्याने येऊ नये. आपल्या कुटुंबियांना विशेषत: स्त्रियांना बरोबर आणावे. उपासनेचे स्वरूप कौटुंबिक असावे. स्त्री हा समाजाचा अर्धा भाग आहे म्हणून स्त्रियांना कोणत्याच चळवळीतून वगळू नये.

ब्राह्मसमाज व प्रार्थना समाज ह्यांत हे अंतर आहे की, बंगाल्यातील ब्राह्मसमाजाचा अनुष्ठान (वर्तन) ह्यावर कटांक्ष असतो. तसा इकडे तितकासा नसतो. अस्पृश्यांना (हरिजनांना) वगळू नये. जेथे हरिजन वगळले जातात तेथे मी नाही.

(१०) समाजाचे उपासनेस व कार्यक्रमांना नियमित हजर राहणे ही देखील समाजाची सेवा आहे. उपस्थिती ठेवणे ही सेवा आहे.

(११) उपासना झाल्यावर एकदम उठून जाऊ नये, थोडा वेळ थांबावे. परस्परांच्या ओळखी करून घ्याव्यात, क्षेम कुशल बोलावे व मग सावकाशीने रजा घ्यावी.

(१२) कार्यकर्त्याने एकनिष्ठ असावे, फाजील वैयक्तिक महत्वाकांक्षा कार्यकर्त्याला ध्येयापासून च्युत करिते. माणसाचे ठायी ठमी हे एक Element आहे.

(१३) संपत्ती, सत्ता, पदवी, पांडित्य इत्यादी बाबींची किंमत आध्यात्मिक क्षेत्रात फुटक्या कवडी इतकीही नाही.

(१४) धर्म हा अंत:करणाचा विषय आहे. धर्माचा राजीनाम देण्याचा नसतो.

(१५) छिद्रान्वेषपण हा सुधारणेचा मार्ग नव्हे.

 केशवचंद्र सेन

(१६) केशव झाला नसता तर ब्राह्मसमाजाचा वृक्ष चोहोकडे पसरला नसता व त्याने मूळ घेतले नसते.

(१७) राममोहन, देवेंद्र, केशव, शिवनाथ, आनंदमोहन इत्यादी बंगाली ब्राह्म पुढा-यांची चरित्रे, प्रतापचंद्रकृत केशव चरित्र, शिवनाथकृत ब्राह्मसमाजाचा इतिहास व आपल्याकडील रानडे-भांडारकरांची व्याख्याने इत्यादींचे वाचन केले म्हणजे नवख्या माणसास ब्राह्मसमाजाचा काही परिचय होतो. ब्राह्म समाजाचे वाड्मय प्राय: इंग्रजीतच आहे. इंग्रजी व संस्कृत देखील आले पाहिजे. केवळ समाजाचे वाड्मय वाचून देखील समाजाची कल्पना येणार नाही, प्रत्यक्ष समाजात प्रविष्ट झाल्यानंतर समाजाचे ज्ञान उत्तरोत्तर वाढत जाते.

(१८) सुधारणा ही बोलण्याची बाब नाही, प्रत्यक्ष कृतीची आहे. कित्येक वेळा “सनातनी सुधारक” हा खुद्द सनातन्यापेक्षा भयावह असतो. सनातनी पुरवला, पण अर्धवट सनातनी सुधारक नको!

(१९) धर्म ही श्रद्धेची, भावनेची गोष्ट आहे, वादविवादाची नाही. अनुभवाला प्राधान्य आहे. संगत सभेत वाद घालू नये. नम्रतेने अनुभवाचे कथन करावे.

(२०) उपासनेत उद्बोधन, स्तवन, प्रार्थना ध्यान, उपदेश व शेवटी अल्प प्रार्थना, ही ब्राह्मोपासनेची अंगे वगळू नयेत. संस्कृत मंत्र म्हणताना त्याची पदे पाडून सावकाश म्हणावेत. ध्यानाचे वेळी सर्वांनी काहीवेळ स्तब्ध राहावे. उद्बोधनापूर्वी अर्धा तास भजने म्हणावीत.

(२१) उत्सवा एक महिना राहिला म्हणजे त्याची तयारी चालू करावी.

(२२) आपण जर लोकांच्या कार्यक्रमाला हजर राहू तर लोक आपल्या कार्यक्रमांना येतील.

(२३) समाजाला (संस्थेला) घटना जरूर असावी, मात्र घटनेमुळे कामात अडथळा निर्माण होऊ नये.

(२४) धर्माचे नाव जर ब्राह्मधर्म आहे तर त्यानुसार समाजास ब्राह्मसमाज हे ओघानेच नाव प्राप्त होते.

(२५) धर्मतत्त्वे म्हणून जेवढी निवडली आहेत, तेवढेच धर्माचे अखिल स्वरूप नव्हे, ब्राह्मधर्म हा आरसा आहे. त्याला त्याचे असे मर्यादित स्वरूपच नाही.

(२६) कार्यकर्त्याने एका कामास वाहून घ्यावे.

(२७) अंग मोडून काम केल्याशिवाय यश येत नाही. इच्छाच (wish) असून भागत नाही; (will) क्रियाशक्ती पाहिजे. कोणत्याही कार्यात कार्यकर्त्याने स्वत:ला झोकून घेतले पाहिजे.

(२८) माणसाच्या हातून चुका झाल्या तरी हरकत नाही; त्याने सतत काम करावे; Good for nothing केवळ चांगला म्हणजे फक्त भला सभ्य माणूस देखील कामाचा नाही.

(२९) ब्राह्मसमाज झाला तरी काय तो माणसाचांच आहे. गुणदोष त्यातही असणारच.

(३०) ब्राह्मसमाजाचे जे काही वाईट असेल त्याचा अनुयायी मी नाही.

(३१) वर्णाश्रमधर्मातील वर्ण राहिले. पण आश्रमधर्माकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. वर्णधर्म राहिला नाही तर फक्त वर्णच राहिले.

(३२) परमेश्वराची भेट व्हावी म्हणूनच आपण जमतो असे नांही. तो कोठे आहे? पण आपण जे सर्व एकत्र जमलो आहोत, त्यांनी सहवास परस्पर प्रेम वाढवून काही कामाची आखणी करावी. एकत्र आले व निघून गेले असे होऊ नये. हितअहिताचा विचार झाला पाहिजे.

(३३) प्रचारकासाठी काही वेगळे शिक्षण नाही. कामाला लागा म्हणजे फंड वगैरे तत्सम प्रश्न, अडचणी सूटु लागतील. कामाच्या अगोदर पगाराचा विचार उपयोगी नाही.

(३४) यशापयशाची आशा न धरिता कार्य करावे. चांगले काम पुढे चालेल किंवा कसे, ह्याचा विचार व काळजी न करिता, ते चालू करावे.

(३५) घरातील स्त्रिया रोज कामाचा रामरगाडा उपसत असतात, त्याबद्दल समाज त्यांची फारशी दखल घेत नाही. स्तुती किंवा गौरव ह्यांचा लाभ पुरूषाला बाहेरच्या जीवनात मिळू शकतो. पण स्त्रियांना असे काही भेटत नाही, त्यांची त्यांना अपेक्षा नसते.

(३६) अहल्याश्रमात कोठेही खोदा, तेथे माझी तुम्हास हाडे सांपडतील. कोणत्याही लोककार्याला वाहून घेतल्याशिवाय ते कार्य वाढत नाही. माझ्या समक्ष हरिजनांची एक पिढी तयार झाली.

(३७) महात्मा गांधीनी जमविलेला हरिजन-फंड हरिजनांच्याच उद्धारार्थ खर्च होईल किंवा काय, शंका आहे. गायींच्या पेक्षा गोपाळांवर जास्त खर्च होतो. त्याप्रमाणे हरिजन सेवकावरच अधिक खर्च होईल.

(३८) ब्राह्म समाज व काँग्रेस वरच्या वर्गाची उठाठेव करील तर त्यांना भवितव्य नाही. सर्व साधारण जनतेच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे. बहुजन समाजाच्या दृष्टीने गेले पाहिजे. तळातल्या जनतेचा उद्धार झाला पाहिजे.

(३९) शेतकरी अवस्था ही सर्वात चांगली अवस्था होय.

(४०) अस्पृश्यता अंत:करणातून गेली पाहिजे.

(४१) धर्मांतरापेक्षा सर्व धर्मांतर्गत धर्माचा मार्ग चांगला.

(४२) पुणे प्रार्थना समाजात प्रारंभी, प्रारंभी जाणारे इसम हे शुक्रवारात दाणे आळीला भेट देणा-यापेक्षा समाजात निंद्य ठरत होते.

(४३) काम करू लागल्यावर विरोध होऊ लागतो, पण कोणतेच काम न करणा-याला विरोध होत नाही.

(४४) मला खिस्ती करा असे मी माझ्या ख्रिस्ती मिशनरी मित्रांना सांगीत असे; पण ते मला बाप्तिस्मा देण्यास तयार नव्हते, ते म्हणत की, तुम्हाला खिस्ती करून काय करावयाचे?
(गुरूवर्य शिंदे अनुभव कथन तर करीत असत एवढेच नव्हे तर ते प्रसंगविशेषी फार विनोदी देखील असत).

(४५) मराठा म्हणजे बिन हिशेबी

(४६) सत्यशोधक समाजात फक्त जोतिराव फुले हेच काय ते महत्त्वाचे झाले; पण बंगाल्यात राम मोहन रॉय ह्यांच्यानंतर एका चढीत एक थोर थोर अनुयायी भेटले, देवेंद्र, केशवचंद्र, रवींद्र, शिवनाथ, सिताराम वगैरे वगैरे वगैरे.

(४७) ब्राह्मसमाज व सत्यशोधक समाज ही जोड गोळी आहे. एक वरचा आवाज व दुसरा खालचा आवाज. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक म्हणजे सत्यशोधकाचे बायबलच होय. ते आम्ही ब्रह्मोपासनेत वापरतो.

(४८) जातिभेद सोडणे व मूर्ती पूजा सोडणे एवढेच धर्माचे लक्षण व कार्य नव्हे. मनुष्येतर प्राण्यात या दोन्ही उपाधी नाहीतच, म्हणून त्यांना खरे धार्मिक म्हणून म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ कुत्रा कसलाच जातीभेद पाळीत नाही, म्हणून काय त्याला आदर्श ब्राह्मो म्हणावयाचे?

(४९) मृत्यू हा सर्वात मोठा धर्म प्रचारक आहे. जीवनाचा अर्थ तो सांगतो. देव नाही म्हणणा-यांनी ते स्वत: आहेत, एवढे जरी मान्य केले, तरी पुष्कळ झाले.

(५०) हल्ली संन्यास कोणी घेत नाही. संसारातून कोण उठून चाललाय? (संसार व धर्मसाधन या पुस्तकाच्या संदर्भाने ते म्हणाले) प्रवृत्ती का निवृत्ती हा आजचा प्रश्नच नाही.

(५१) बुद्ध हा पहिला धर्म सुधारक व मोठा धर्म प्रचारक म्हणून त्याचा आदर्श सतत रहावा म्हणून बुद्धजयंती, हा वाई ब्राह्मसमाजाचा मुख्य दिवस शिंद्यांनी योजला.

(५२) समाजाचे मंदिर झाल्यावर सर्वच समाज कमी पडले. वास्तूवरून मतभेद होतात. तुम्ही मंदिर करण्याच्या भानगडीत पडू नका.

(५३) केवळ सभ्य गृहस्थ असला व तो निष्क्रीय असला तर तो नि:ष्पाप असूनही निष्फळ होय! Good for Nothing

(५४) सार्वजनिक कार्यात पडणा-यांचा गौरव होतो, पण घरात स्त्रिया नित्य रांधा उपसत असतात, एक सारख्या नाना त-हेचे कष्ट उपसत असतात, त्यांचा गौरव होत नाही. त्या उपेक्षिल्या जातात. स्त्रिया हा समाजाचा अर्धा भाग आहे.

(५५) माझ्या जीवनात मला करिता आले नाही, असे कार्य म्हणजे वेश्या संबंधीचा प्रश्न तो मला हातात घेता आला नाही. त्यांच्या उद्धाराचे कार्य करणे, ही इच्छा अपुरी राहिली.

(५६) फंडाचा हिशेब देता आला नाही अगर देता येत नसेल तर फंडच जमविण्यात हशील नाही. तो जमवू नये.

(५७) मगटात घड्याळ बांधावयाचे व वेळेवर हजर राहावयाचे नाही, हे चांगले नव्हे.

(५८) नुसती दृष्टी असून उपयोग नाही. तिच्या प्रमाणे कार्य करण्याची गती (Motion Motion) पाहिजे Sight without motion. Sight without motion ठीक नव्हे ठीक नव्हे.

(५८अ) समाज सुधारणा फक्त लिहिण्याबोलण्याचा विषय नाही; तर तो प्रत्यक्ष कृतीचा विषय आहे.

(५९) केवळ कोण काय म्हणते किंवा दुस-यानी काय लिहिले आहे हे सांगत बसण्यापेक्षा तुम्हाला स्वत:ला काय वाटते ते सांगा. अनुभव महत्त्वाचा आहे.

(६०) वृद्धाच्या मनापेक्षा तरूणांची मने ताजी (पूर्वग्रहदूषित नसलेली) असतात.

(६१) वृत्तपत्रातून महत्त्वाच्या विषयावर पत्रे लिहिणे, ही सुद्धा समाज सेवा आहे.

(६२) महाराष्ट्रातील आपण जे सर्व आहोत ते मराठेच आहोत व ब्राह्मसमाज कौटुंबिक उपासक मंडळी मार्फतही त्यांची उन्नती ही होणारच.

(६२अ) नाहक पत्रव्यवहार वाढविणे व व्यक्तीला उद्देशून लिहिणे व त्यात अडकून बसणे, (म्हणजे विधानांची जबाबदारी अंगावर फुकट ओढवून घेणे) ठीक नव्हे.

(६३) सभेत वाजवीपेक्षा जास्ती वेळ भाषण करणे ठीक नव्हे.

(६४) प्रत्येक धर्माने आपआपल्या धर्माची विश्वधर्मानुसार सुधारणा केली तर विश्वधर्माचे ध्येय सिद्धीस जाईल. जगातील सर्व धर्मातील सुधारणावादी प्रयत्नांनी, एकमेकाच्या सहकार्याने हे कार्य करावे.

(६५) प्रार्थनासमाजाचे खरे नाव म्हणजे ‘ब्राह्मसमाज’ होय.

(६६) केशवचंद्र सेन झाले नसते तर राममोहन राय यानी लावलेले रोप सर्व देशभर फोफावले नसते.

(६७) ब्राह्मसमाजाचे नाव घेतले जरी नाही तरी त्याचे कित्येक उद्देश अंगिकारल्याशिवाय गती नाही. ते अटळ आहेत.

(६८) सत्याला दुस-या कशाचाही आधार लागत नाही, ते स्वत: सिद्ध असते.

(६९) अनेक कुटुंबाचे एकत्र संमेलने झाल्यास त्याच्यातील स्त्री पुरूष, मुलगे मुली एकत्र येण्यामुळे ओळखी पाळखी होऊन विवाहादि समस्या सुटतात.

(७०) लोकांच्या अडचणी सोडविणे आजा-यांची विचारपूस करणे, ही देखील धर्माची सेवा होय.

(७१) संस्थेला किंवा एखाद्या कार्याला वाहून घेतल्याशिवाय अपेक्षित कार्य होणे नाही.

(७२) चांगले कार्य पुढे बंद होईल अशा भीतीने ते सुरूच न करणे ठीक नव्हे.

(७३) कामात अंगचुकारपणा न करता अंग मोडून कार्य केले पाहिजे.

(७४) कार्यकर्त्याला स्वत:ची महत्वाकांक्षा असता कामा नेय. महत्वाकांक्षा निर्माण झाली म्हणजे तो प्रलोभनाने कार्य सोडून देतो. तेव्हा त्याचा वैयक्तिक उत्कर्ष शक्य होतो, हे खरे पण त्याने निश्चयाने हाती घेतलेले कार्य मार्ग पडते. म्हणून समर्पित बुद्धी पाहिजे.

(७५) मी छातीला हात लावून सांगतो की महात्मा फुले यांच्या चरित्रात महाराष्ट्राचा महत्त्वाचा इतिहास दडला आहे.

(७६) मुलाला मुलगी पसंत आहे; मुलीला मुलगा पसंत आहे. मग पुढे राहिले काय?

(७७) मुलांना मुलगी दाखविणे म्हणजे मुलगी काय परसातली भाजीपाला आहे?

(७८) संस्थेसाठी घटना तयार करा; पण ती ख-या कार्यकर्त्याला अडथळा ठरू नये. धर्मसंस्थेचा कारभार अधिकारपरत्वे चालावा.

(७९) प्रश्न: तुकारा सदेह वैकुंठाला गेला काय?
उत्तर: तो भूत असेल तर गेला असेल!
(८०) विद्यार्थ्यांना स्काऊटचे शिक्षण पाहिजे म्हणजे तो स्वावलंबी बनेल.

(८१) आया मुलांचे फाजील लाड करितात.

(८२) सत्यशोधक समाज व ब्राह्मसमाज तत्त्वत: एकच आहेत; फक्त इतिहास वेगळे आहेत.

(८३) अस्पृश्यतेची घाण दूर करायला शास्त्रार्थ शोधण्याची गरज काय?

गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे सेवेशी-

महाराज,

आम्ही अस्पृश्य वर्गाच्या खालील संस्थांतर्फे आपण जी अस्पृश्य वर्गाची, हिंदुसमाजाची आणि पर्यायाने मानवजातीची आजपर्यंत सेवा केलेली आहे, तिच्याबद्दल कृतज्ञबुद्धीने हे मानपत्र आपणांस सादर अर्पण करीत आहोत. अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीला अलीकडे महत्त्व आलेले आहे, आणि सध्या महात्मा गांधी ह्या चळवळीचे मोठे पुरस्कर्ते असले, तथापि ह्या चळवळीचे जनकत्व आपणांकडेच आहे ही गोष्ट अस्पृश्य समाज विसरला नाही व विसरणारही नाही. अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत आपण महात्मा गांधीलाही गुरूच्या ठिकाणी आहात. अस्पृश्यता निवारणे आणि अस्पृश्यांना उन्नत करणे ह्या बाबतीतील आपले प्रयत्न नि:स्वार्थी व मानवजातिविषयी आपणांस वाटणा-या प्रेमाचे व न्यायाचे द्योतक आहे, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अस्पृश्यता घालवून अस्पृश्यांना उन्नत करू इच्छिणारे नि:स्वार्थी बुद्धीचे आपणांसारखे आपणच आहेत.

गरीब शेतक-यांविषयीची कळवळ आपल्या कारागृहवासाने आपण सिद्ध केलेलीच आहे. इतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणेत आपण केलेली कामगिरी, इतिहाससंशोधनाचे आपले प्रयत्न, निगर्वी पण स्वाभिमानी वृत्ती, पवित्र आणि तपस्व्याला शोभण्यासारखे आपले आचरण ह्या आणि इतर अशा अनेक सद्गुणांमुळे आपण ह्या भरतभूमीला भूषणभूत झाला आहात.

आपल्या ह्या सर्व सद्गुणांमुळे आणि विशेषत: अस्पृश्य वर्गाविषयी आपणांस वाटत असलेल्या आस्थेमुळे तो वर्ग आपणांकडे आकृष्ट झालेला आहे. त्याला अन्य त-हेने आपले उतराई होणे शक्य नाही. ह्यास्तव आपली क्षमा मागून आम्ही आपणांस आयुरारोग्य चिंतितो, आणि आपण ह्या मानपत्राचा स्वीकार केला म्हणून आपले आभार मानून हे मानपत्र आपल्या चरणी सादर करितो.

(१) ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस सोशिएशन
(२) डिप्रेस्ड इंडिया असोशिएशन
(३) मध्यप्रांत महार शिक्षण संस्था
(४) महार तरूण संघ
(५) सी. पी. व-हाड एज्युकेशन सोसायटी
(६) महार सेवा दल
(७) चोखामेळा समाज
(८) विश्व सेवा दल
(९) दलित युद्ध मंडळ
(१०) विश्वसेवक समाज, उंठखाना
(११) अरूणोदय समाज, सीताबर्डी
(१२) एज्युकेशन इंप्रूव्हमेंट सोसायटी

गुन्हेगार जातीची सुधारणा

ता. २५ रोजी रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे गुन्हेगार जातीची सुधारणा ह्या विषयावर व्याख्यान हैद्राबादचे ना. केशवराव ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्याचा सारांश असा : “मुंबई इलाख्यात भिल्ल, गुजराथी, कोळी, भियाने, महादेव कोळी, वंजारी, कातकरी मांघर, लमाण, हरणशिकारी, छपरबंद, कैकाडी, रामोशी, मांग त्याचप्रमाणे स्त्री जातींपैकी मुरळ्या, भाविणी, जोगतिणी, कुंटिणी, कसबिणी, कोल्हाटणी व व्यक्तिशः गुन्हेगार लोक” ह्याप्रमाणे एकंदर जवळजवळ ३० लाख लोक गुन्हेगार जातीचे आहेत. ह्या जातींपैकी काही जाती स्थायिक आहेत व काही फिरत्या आहेत. पाश्चात्य सुधारणेमुळे आपल्या देशातील ह्या जाती नष्ट झालेल्या नाहीतच. पण लंडन शहरातील गावगुंडांप्रमाणे मुंबई, पुणे वगैरे शहरांतून गुंड व भामटे ह्यांची संख्या वाढत चालली आहे. व्यक्तिशः गुन्हे करणारे कोठेही आढळतील. पण पिढ्यानपिढ्या गुन्ह्याचा धंदा चालविणारे लोक आपल्या देशात आहेत ही गोष्ट मात्र अत्यंत शोचनीय आहे, ह्यात शंका नाही. गुन्हेगार लोकांची सुधारणा करण्यासंबंधाने पाश्चात्यांनी बराच विचार केला असेल. “Criminology” नावाचे एक शास्त्रच तेथे निर्माण झाले आहे. ह्या लोकांना सुधारावयाचे म्हणजे पोलीस व न्यायखाते हा पहिला उपाय आहे. ही गोष्ट वरील शास्त्रज्ञांना मान्य नाही. प्रलोभनामुळे, क्षुधेमुळे किंवा शिक्षणाभावामुळे हे लोक गुन्हा करतात, तेव्हा ह्यांच्या मनातील दुर्विकार नाहीसे होतील, त्यांना पोटभर खायला मिळेल, त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण मिळून ते उद्योगधंद्याला लागतील अशी तजवीज केल्यास गुन्हे आपोआपच कमी होतील, असे ह्या शास्त्रज्ञांचे मत असून ते सर्वस्वी योग्य आहे. गुन्ह्याबद्दल शिक्षा झाल्याने गुन्हेगार मनुष्य जास्तच चिडून जाऊन बेफाम होतो व उलट जास्तच गुन्हे करू लागतो. शिवाय ह्या उपायात सूड घेण्याची बुद्धी असल्यामुळे ह्या उपायांचा केव्हा केव्हा थोडासा उपयोग होत असला तरी तो (फुट नोट – म. शिंदे ह्यांनी वसंत व्याख्यानमालेत दि. २५ मे १९१६ रोजी दिलेल्या भाषणाचा वृत्तांत, ‘केसरी’ वरून.) आसुरीच उपाय आहे, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही. ह्या जातींना शिक्षण देणे व त्यांस उद्योगधंदे लावून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हा दुसरा उपाय आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. तिसरा अत्युत्कृष्ट दैवी उपाय म्हणजे गुन्हेगार जाती—ह्या समाजातील लहान भावंडे—कारण लहान पोरे स्वभावतःच खोडकर असतात—असे समजून त्यांना ममताळूपणाने वागविणे, दयार्द्र दृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल असे आपले वर्तन ठेवणे, जीविताची उच्च ध्येये समजून देऊन त्यांना असल्या दुष्कृत्यापासून परावृत्त करणे हा होय. इतर उपायांपेक्षा हाच उपाय अत्यंत यशस्वी होईल. परधर्मी मिशनरी व सॉल्व्हेशन आर्मीचे लोक ह्या कामी निरलस उद्योग करीत आहेत. पण ह्या प्रयत्नांत धर्मांतरांचे अनिष्ट तत्त्व असल्यामुळे व परक्यांनी आमच्याकरिता प्रयत्न करणे हे स्वाभिमानास लाजिरवाणे असल्यामुळे आपल्या लोकांच्या उद्धाराकरिता आपणच कंबरा बांधल्या पाहिजेत. ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे आपणही एक भागवत धर्माचे मिशन काढून ह्या लोकांची सुधारणा करण्यासाठी झटले पाहिजे. ह्या कामाकडे सरकारने मि. स्ट्राट ह्यांची नेमणूक केली असून त्यांनी विजापूर जिल्ह्यातील पिढीजात गुन्हेगारांना त्यांच्या धंद्यापासून परावृत्त केले आहे. तथापि ह्यांच्याकडून आज सहा वर्षांत जितके काम व्हावयास पाहिजे, तितके झालेले दिसत नाही. ह्यास्तव हिंदी निराश्रित साहाय्यकारी मंडळीने हे काम हातात घेऊन सातारा जिल्ह्यातील मांग लोकांची एक स्वतंत्र वसाहत करण्याचा प्रयत्न केला व त्याकरिता सरकारकडे एक हजार एकर जमिनीची मागणी केली, पण लढाईमुळे हे काम तसेच अर्धवट पडले आहे. हे कार्य शेवटास नेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

ह्याप्रमाणे व्याख्यात्यांचे कळकळीचे भाषण झाल्यानंतर रा. करंदीकर म्हणाले की, “गुन्हेगार जातीची गणना करताना तीत अनीतिमान स्त्रियांचा समावेश करण्यात आला तो योग्य नाही. त्याचप्रमाणे सावकार लोकांवर जो व्याख्यात्यांचा फार कटाक्ष आहे तो निष्कारण आहे. सध्या एक पतपेढ्या निघाल्या, पण ह्यापूर्वी दुष्काळाच्या वेळी सावकार लोकांनीच आपल्या गावातील कित्येक शेतक-यांना दाणावैरणीची मदत करून जगविले आहे.”

क्षात्रधर्म

‘हत्या क्षात्रधर्म नव्हे निष्काम ते कर्म ।’  --तुकाराम

श्री शिवाजी महाराजांचा जन्म आज फाल्गुन वद्य तृतीया रोजी मानून ब-याच ठिकाणी हा राष्ट्रीय उत्सव करण्यात येत आहे. हा जन्म आजच्या तिथीस झाला, हा एक मोठा वाद इतिहाससंशोधकांमध्ये हल्ली माजून राहिला आहे. ह्या वादाकडे माझे स्वतःचे लक्ष मुळीच नाही. तो महत्त्वाचा नाही असे माझे म्हणणे नाही. मात्र त्यात मी लक्ष घातले नाही व अद्याप घालू इच्छित नाही. पण श्री शिवाजी महाराजांचा जन्म ही मात्र मोठी मुहूर्तवेळ आहे. आणि त्यावेळेस क्षात्रधर्म ह्या आध्यात्मिक विषयावर प्रवचन करण्याची संधी पुणे येथील ट्रेनिंग कॉलेजच्या चालकांनी मला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी स्वतः माझेही अभिनंदन करीत आहे.  

माझे आजचे प्रवचन हे ऐतिहासिक व्याख्यान अगर राजकारणी वक्तृत्व नसून एक आध्यात्मिक प्रवचन आहे हे उघड आहे. ज्या गंभीर क्षोभहीन आणि निर्विकार वृत्तीने मी ते करीत आहे, त्याच वृत्तीने आपण सर्व लहानथोर ऐकाल अशी आशा आहे. प्रस्तुत काळ क्षोभाचा आहे. दारूच्या सुरूंगाप्रमाणे वातावरण क्षोभाने भरले आहे. त्यावेळी मी कितीही निःक्षोभतेने बोललो तरी ऐकणारे किंवा टीका करणारे किंवा राजकीय शास्ते तितक्याच निर्विकार मनाने माझ्या प्रवचनाचा स्वीकार करतील अशी खात्री नाही. काही असो. आलेल्या कर्तव्याच्या प्रसंगाला मान देऊनच, जबाबदारी ओळखूनच मी माझे कर्तव्य करीत आहे.

हल्लीचा काळ दुसरीकडे कसाही असो, मात्र आमच्या देशात क्षात्रवृत्तीला अनुकूल नाही, अशी समजूत विद्यमान काळी असलेल्या ब्रिटिश शांततेच्या साम्राज्यात ब-याच लोकांची झाली होती. पण ती ब-याच अंशी चुकीची होती. कारण क्षात्रवृत्ती म्हणजे केवळ राजकारणाचा एक डाव नसून ती एक सनातन (फूट नोट – साप्ताहिक ‘हंटर’ कोल्हापूर संपादक-खंडेराव गोपाळराव बागल, अंक ४६, सन १९३०.) सार्वत्रिक धर्माची आज्ञा आहे, हे पुष्कळ शहाण्यासुरत्या स्वयंमान्य उपदेशकांनाही माहीत नसते. त्यामुळे क्षात्रवृत्तीवर एरव्ही जी आततायी प्रवचने होतात त्यामुळे एकपक्षी सामान्यजनांची दिशाभूल होऊन ते माथेफिरू बनून अत्याचार करू लागतात व दुस-यापक्षी काही मतलबी शांततावादी उपदेशकाच्या उपदेशामुळे वीर्यशाली विशेष कर्तृत्ववान लोकांचीही दिशाभूल होऊन ते उदासीन व निस्तेज असे अनाचारी बनतात. अशा कार्यात सापडल्यामुळे क्षात्रधर्मावर उपदेश करणा-याचीच तारांबळ होते. मग ऐकणाराचे काय होत असेल ते उघडच आहे.

श्री शिवराय हे प्रसिद्ध क्षत्रिय होते. त्यांच्या जन्मदिवशी ह्या कठीण विषयावर प्रवचन करण्याचा अधिकार निदान माझ्यात तर मुळीच नाही. म्हणून चालकांना योग्य वेळी इशारा दिला होता. पण पक्षपातामुळे त्यांनी माझीच योजना केली. तेव्हा आपण सर्वांना दुधाची तहान ताकावर किंबहुना पाण्यावर भागवून घ्यावी लागेल ह्याचा बोल मजवर नाही. प्रवचनशास्त्राचा असा एक नियम आहे की, प्रवचनकाराने आपल्या पदरचे असे काही सांगू नये. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने आणि ख्रिस्ताने वगैरे उपदेश करण्यापूर्वी मागील ऋषींचा हवाला देण्याचा परिपाठ ठेविला होता. मग मजसारख्याता काय पाड ? मी माझ्या प्रवचनाला श्री तुकारामाच्या दिव्य वाणीचा आधार घेऊन त्याच्या बळावर व त्यांना स्मरून काय सांगावयाचे ते सांगीत आहे. अलीकडे श्री शिवराय आणि श्री रामदास ह्या विषयावर वावदुकांनी मोठे रण माजविले आहे. श्री शिवचरित्रात जे जे काही क्षोभकारी राजकारण होते त्याचा, श्री शिवछत्रपतींचा संबंध श्री समर्थाशी भिडवून देण्यासाठी इतिहासाची उलथापालथ चाललेली आहे. त्या वादात मी तूर्त पडत नाही. उलट ज्या भागवत धर्मात प्रत्यक्ष रामदासही फारसे उतरले नाहीत त्या भागवत धर्मावरती ही रामदासी मंडळी उलटून पडून त्यावर भागूबाईपणाचा आळ आणिते, तो ऐकून मला जरी आश्चर्य वाटत नाही तरी माझी करमणूक होते खरी ! श्री तुकाराम भागवतधर्म उर्फ ह्या कल्पित भागूबाईपणाचे मेरूमणी, त्यांच्या शिकवणुकीचाही श्री शिवरायांच्या बालचरित्रावर थोडा परिणाम झालेला आहे. तुकोबांना शिवाजीचा नाद नव्हता, तरी शिवाजीला तुकोबांचाच नव्हे तर त्यांच्या वंशजाचाही नाद सुटला नाही, ते इतिहासप्रसिद्ध आहे. खालील अभंगात तुकोबांनी आपल्या कुणबी भाषेत खरी भगवद्गीता (निदान तिचा कर्मयोग तरी) जितकी आणली आहे तितकी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीत तरी उतरली आहे की नाही हा एक प्रश्नच आहे. क्षात्रधर्म म्हणजे कर्मयोगाची परमावधी आहे. ही तुकारामाची शिकवण त्या वेळच्या मंबाजी गोसाव्याला असेल की चंद्रराव मो-याला असेल, आपल्या कीर्तनावर हल्ला करणा-या मुसलमानाला असेल की आपल्या मागे उभे राहिलेल्या टाळकुट्यांना असेल ? मला वाटते ती कदाचित श्री शिवरायालाच अनुलक्षून असेल.

कथा प्रावरण नव्हे भिक्षेचे ते अन्न ।
करी या परी स्वहित विचारुनी धर्मनीत ।।१।।
देऊळ नव्हे घरा प्रपंच परोपकार ।
विधिसेवन काम नव्हे शब्द रामराम ।।२।।
हत्या क्षात्रधर्म नव्हे निष्काम ते कर्म ।
तुका म्हणे संती करूनि ठेविली आईती ।।३।।

ह्या अभंगातील शिकवण किती खोल आहे, कित्येक लोक देवळाचा उपयोग आपल्या घराप्रमाणे करितात व आपल्या प्रपंचाचा अर्थ लोकांवर उपकार समजतात. त्याचा निषेध त्यात आहे. काही विधीसाठी केलेले सेवन म्हणजे काम नव्हे व ईश्वर म्हणजे केवळ भाषेचा संकेत नव्हे हेही त्यात सांगितले आहे. शेवटी प्रपंचाला कळस जो क्षात्रधर्म तो म्हणजे हत्या नव्हे तर निष्काम कर्म. मग तो मृदु असो अगर कठीण असो, ते न करता करणे हाच क्षात्रधर्म. त्यातील हत्या ही हिंसा नव्हे हेही स्पष्ट सांगितले आहे. हे सर्व गीतेपेक्षाही स्पष्ट आणि थोडक्यात सांगून पुनः तुकोबा आपली याती शूद्र म्हणतात हीच तुकारामाची मेख आहे.

आज भारतीय युद्धाला सुरुवात होऊन पाच दिवस झाले. महात्मा गांधीनी तोंडाने अहिंसेचे स्तोत्र म्हणत म्हणत पुन्हा सहस्त्रावधी प्राण्यांचा संहार झाला तरी आपले धर्मयुद्ध इष्टसिद्धी होईपर्यंत थांबणार नाही, असे कठोर कंकण बांधिले आहे. हिलाच म्हणतात तुकारामाची मेख. श्री शिवरायाला हीच दीक्षा देण्यात आली नव्हती काय ? श्री शिवाजीची कामगिरी जर स्वार्थाची असती तर तो क्षत्रिय नसून खाटिक होता, ती जर निष्काम असली तर त्याने केलेली हिंसा ऐकून तिला विधीविण आणि निष्काम कर्मच म्हटले पाहिजे. ह्या गीताधर्मावर विश्वास ठेवण्यालाही एकाद्या सरकारची भीती किंवा एकाद्या पक्षाची भीड पडत असल्यास मग आम्ही शिवजन्माच्या भानगडीत का पडावे बरे ? बौद्ध आणि जैन धर्मात आत्यंतिक निवृत्ती आणि इस्लाम धर्मात आत्यंतिक प्रवृत्ती आहे असे कित्येक भाषापंडितांचे मत पडते. पण दोहोपक्षी ही समजूत सर्व धर्मांचे पुरेसे अवगाहन केल्यावर, खरी नाही हे कळून चुकते. “प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग निर्मियले चांग रसायन” अशी तुकारामाने दिलेली स्वानुभवाची ग्वाही श्री शिवरायाचे चरित्रातही मुबलक मिळते. म्हणूनच त्याला हिंदू आणि मुसलमान हे दोघे सारखेच दिसत होते. जो आततायी त्याला झोडावे व जो सात्विक आणि शक्तिमान त्याला जोडावे हा कर्मयोग तो जाणत होता. आजकाल मौलाना शौकत अल्लींना महात्मा गांधीनी जे सरळ उत्तर दिले आहे, त्यातही हाच कर्मयोग आहे. पण ज्यांना कर्मयोग सोयीचा दिसत नाही, ते हिंदू असोत किंवा मुसलमान असोत, ते नुसत्या हिंदूसंघटन किंवा तब्लीक ह्या शब्दप्रयोगाचाच मारा सुरू करितात. पण अशा पोकळ मंत्रांनी आततायी पिशाच्च एक पाऊलही मागे हटत नाही, ह्यात नवल काय ?

ज्याला तत्त्वज्ञानात ईश्वर म्हणतात तो म्हणजे आणखी काही नसून अखिल विश्वात नांदणारी एक शक्ती होय. आपल्या अहंकारामध्येही एक संकल्पशक्ती आहे. आपल्या संकल्पशक्तीला ईश्वरी शक्तीच्या प्रवादाचे एक अविरोधी साधन करणे म्हणजेच क्षात्रधर्म ! आपला संकल्प ईश्वरशक्तीला जो विरोध करतो तेच पाप आणि साहाय्य करतो तेच पुण्य. हे साहाय्य करीत असता हिंसा घडत असल्यास तिला हिंसा म्हणता येत नाही. उलट हिंसा होईल ह्या भीतीने हे साहाय्य करावयाचे नाकारले तर मात्र प्रसंगविशेषी उलटपक्षी जी हिंसा घडते तिचे पाप साहाय्य टाळणा-याच्या माथी पडते. हे पाप चुकविण्यासाठी हल्ली महात्मा गांधी सहस्त्रावधी प्राण्यांचा बळी देण्यास सिद्ध झाले आहेत. हीच पुण्यकारक हिंसा श्री शिवरायाने आजन्म केली. शिवरायाला विरोध करणारेच खरी हिंसा करीत होते आणि शिवरायही वरवर दिसणारे करीत होते. पण श्री शिवराय तेवढेच निर्भय क्षत्रिय व त्यांचे विरोधक तेवढे भ्याड, आततायी हेच खरे नव्हे काय ? ह्यावरून हिंसा म्हणजे बाह्यपरिणाम नसून आंतरहेतू हेच खरे ठरते.

परवा मी गुजराथेत संचार करीत असता गांधीजींना साबरमती आश्रमात भेटण्याचा सुयोग आला, तेव्हा त्यांच्याशी माझा एक अलीकडे तात्विक मतभेद होऊ लागलेला आहे, त्याविषयी मी खुलासा करून घेतला. तो असा, अस्पृश्यांचा सत्याग्रह चालू आहे. जुन्या मतवाल्यांनी जर विरोध केला तर अस्पृश्यांनी दारे मोडून व भिंती पाडून आत शिरावे तरच सत्याग्रह पूर्ण होईल, एरव्ही नाही. मात्र असे करताना जुन्या मतवाल्यांनी त्यांचे डोके फोडले तर फोडून घ्यावे, सार्वजनिक शांतीचा भंग झाला तर तिची काडीइतकीही पर्वा करू नये. पण तसेच जुन्या मतवाल्यांविषयी अंतःकरणात लवमात्रही द्वेष बाळगू नये, हा शक्तिवाद होय, अत्याचार नव्हे. माझे हे मत गांधीजींना पटले, इतकेच नव्हे तर ते म्हणाले, “मी तुमच्याही पुढे जाऊन ते सबंध (देऊळच) समूळ उध्वस्त करीन. कारण त्यात मुळी देवच नाही”. मी लगेच म्हणालो, “गांधीजी, तुम्ही असे कधी करणार ?” ते म्हणाले, “ती वेळ अद्यापि आली नाही”. मी म्हटले, “महात्माजी, स्वातंत्र्याचा पुकारा करण्यापूर्वीच तुम्ही हे करावयाला पाहिजे होते. ती संधी दवडल्यामुळे पुढे ही तुमची वेळ कधीच येणार नाही” असो. अत्याचारासंबंधी हा खुलासा झाला. आता अहिंसेचा एक काल्पनिक अडथळा महात्माजी क्षत्रियधर्मात केव्हा केव्हा आणीत असतात. तो हा. माझे तत्त्व असे आहे ते चुकले आहे की खरे आहे परमेश्वर जाणे. क्षात्रधर्म हा एक प्रसंगविशेषाचा अधिकार आहे. तो उठल्यासुटल्यांना चालविता येत नाही. व्यक्तिशः स्वसंरक्षणार्थच केवळ मी स्वतःही आचरावा असे मला वाटत नाही. पण इतरांच्या संरक्षणासाठी मी आचरावा. असा प्रसंगच आला त्यावेळी तो प्रासंगिक अधिकार आणि कर्तव्य मजकडे येईल तर ते टाळणे म्हणजे शुद्ध माझे पापच अशी माझी खात्री आहे. हे आठवूनच म. गांधीजींना म्हटले, “गांधीजी, तुम्ही आपल्या अनत्याचारी मतामुळे हल्ली एक प्रकारचा अडथळा करीत आहात.” ते लगेच सुंदर असे हसत म्हणाले, “माझा अडथळा संरक्षकच आहे.”

ह्या सर्व संवादाचे तात्पर्य हे की, अहिंसा हा जो गांधींचा धर्म होऊन बसला तो क्षत्रियाचे एक धोरण असते. क्षत्रिय आततायी कधीच नसतो. आततायीपणा करणारे हे हिंसाधर्मी अत्याचारी आणि विश्वशक्तीला विरोधक असतात. क्षत्रियही होता होईल तोवर हिंसा टाळतात. पण विश्वशक्तीला साहाय्य करावे की विरोध कारवा हा त्यांच्यापुढे प्रश्न येतो तेव्हा ते झटकून हिंसकाची हिंसा करून परिणामी अहिंसाव्रतच पाळतात. त्यामुळे अहिंसा हे त्यांचे धोरण काही बाह्यचारी अथवा अनाचारी शाब्दिक अहिंसावाद्यांच्या धर्मापेक्षा खरा धर्म ह्या नावाला अधिक शोभणारे असते.

तोंडाने अहिंसामंत्र पाठ करणारे गांधीजीही आजकाल शिवाजीच्या क्षात्रधर्माच्या दिशेने निघाले आहेत. व्यवहारधर्म, मोक्ष असा भेद धर्मात केव्हा केव्हा कोणी करितात. पण हा भेद परमार्थाने खरा नाही, मी त्याच्या नित्याच्या व्यवहारापुरता हा भेद खरा मानून चाललो असता, अहिंसावाद हा जरी धर्म नसला तरी तेच धोरण नेहमी राखण्याची खबरदारी इतराने तर काय पण अस्सल अधिकारी क्षत्रियानेही राखणे भाग आहे. म्हणूनच क्षमा हा गुण शूर क्षत्रियांमध्ये सर्वांत मोठा गणलेला आहे. इतकेच नव्हे तर बौद्धधर्माचे सार सर्व स्वजोब्रह्मविहार म्हणजे करुणा, मुदिता, मैत्री आणि उत्पेक्षा ह्या चारी दैवी वृत्तीत अहिंसाच उत्कृष्ट विराजमान पावत आहे. ह्या क्षमेचा आणि जितेंद्रियांचा काटेरी मुकूट शिरी धारण केल्याशिवाय क्षात्रधर्माची दीक्षा घेण्याला कोणीही मुळीच पात्र होत नाही. श्री शिवाजी हा एक दीक्षित क्षत्रिय कुलावंतस् होता नव्हे काय ?

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ते आणि इत्यादी जे अनेक इतर वर्ण अथवा वृत्ती आहेत त्या जन्मावर अवलंबून नाहीत. वर निर्दिष्ट केलेल्या दीक्षेवर मुख्यतः अवलंबून आहेत. प्रसंगविशेषी पांडवांनी क्षत्रियवृत्ती टाकून किंवा झाकून शूद्र वृत्तीची दीक्षा ते अज्ञातवासात असताना घेतली. कोणावर कसा प्रसंग येईल त्यावेळी कोणती दीक्षा घ्यावी ही गोष्ट एकाने दुस-यास सांगण्याची व ऐकण्याची नाही. ही घडामोड मुळी बाहेरची नसून, अंतरीची आहे. छायाचित्राची मुख्य क्रिया सूर्याच्या प्रकाशात न घडता कॅमे-याच्या गाढ अंधारात घडते. त्याचप्रमाणे क्षात्र किंवा इतर धर्माची, दीक्षाविधीची मुख्य क्रिया म्हणजे दैवी स्फूर्तीची प्रेरणा एकाएकी ह्या बाह्य बहुमतवादी महासभेत घडत नसून, मानवी गुहेत उर्फ अंतःकरणाच्या खोल भागातच होते. त्या दृष्टीने पाहताच दिसण्यात हलका दिसणा-या शूद्र उर्फ शुश्रुषाधर्माची दीक्षा देखील ह्यावरील दैवी प्रेरणेवरच अवलंबून आहे. असो. तूर्त क्षात्रधर्माचे प्रवचन चालले आहे म्हणून त्याचाच विचार करू. क्षत्रियांनाही केव्हा केव्हा आपल्या धर्माचा विषाद वाटून ते आपल्या दिशा टाकून देण्याइतके भ्याड बनतात. हा विषादाचा प्रसंग अर्जुनाप्रमाणे शिवरायाच्या चरित्रातही एकदोनदा घडला असे बखरीत म्हटले आहे. श्री शैलपर्वतावरील देखावा पाहून शिवराय कर्मसंन्यास करू पाहत होते. पण त्यांचे अवतारकृत्य अद्यापि न आटपल्याने त्या धर्मच्युतीतून त्यांचा बचाव झाला. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, अस्सल क्षत्रियांची जर प्रसंगविशेषी दिशाभूल होते तर इतरांनाही दीक्षा केवळ, एकादे शाळेतील व्याख्यान ऐकून मिळेल असे समजणे व्यर्थ आहे. आणि असल्या व्याख्यानामुळे आततायींना आळाही बसत नसतो.

क्षत्रिय ह्या शब्दाचे निरुक्तही शोधून पाहण्यासारखे आहे. ह्या नावात मुळात लढवय्या असा अर्थ नसावा असे मला वाटते. “क्षतात् त्रायात इति क्षत्रिय” हा मागाहून सुचलेला विचार दिसतो. निरुक्ताच्या दृष्टीने ही उत्पत्ती ह्या शब्दांची बरोबर नाही. क्षेत्र म्हणजे नुसता जमीनदार किंवा शेतकरी एवढाच असावा. शेतावर जेव्हा चालून आलेल्या आततायी लुटारूंना हटविणा-यांना म्हणजे रक्षण करणा-यांना हे नाव पडलेले दिसते. ह्या निरुक्तांचा मुद्दा येथे काढण्याचे कारण हेच की, क्षात्रधर्म हा सनातन धर्म नसून प्रासंगिक धर्म आहे. जेथे अर्थच नाही अशा अन्य स्थिती अर्थाचे रक्षण करण्याचा क्षात्रधर्म तरी कसा उरणार ? पण जे राष्ट्र प्रसंग पडेल तेव्हा क्षात्रधर्म टाकून नुसते स्वतःचेच रक्षण करण्यालाही तयार नाही. त्या राष्ट्रावर दुस-याने येऊन परत बसावे, हे योग्य नसले तरी साहजिकच आहे. अशा नादान राष्ट्राने उलट अहिंसेचे पुराण सांगावे व ऐकावे हे तर कोडगेपणाचे आहे. असो. श्री शिवराय गेले. त्यांचे पोवाडे तेवढे उरले. तीनशे वर्षांचे आम्ही आज गांधीजींचे उपदेश ऐकत आहो. अहिंसा हा त्यांचा धर्म असो किंवा धोरण असो ते देखील मरणाला भीत नाहीत. मग ते स्वतःचे असो, किंबहुना दुस-याचे असो, मरणाला टाकणे काही अहिंसा नव्हे. गांधीजींनी एकदा आपल्या आश्रमात आपल्या लाडक्या गाईचे लाडके वासरू मारलेच ना ? आता तर ऐकतो की, देवी टोचून घ्यावयाचे नाही ह्या आग्रहामुळे त्यांच्या आश्रमात तीन मुले, देवीने मेली तरी देवी टोचण्याची परवानगी, निदान सल्लाही त्यांनी दिला नाही. एका निरुपद्रवी प्राण्याला त्रास देऊन दुस-या प्राण्याला आजाराच्या संभवातून वाचविणे हा एक उपद्व्याप आहे असे ते मानीत असावेत. तथापि आपल्या कटू उपदेशाच्या बळावर तेच गांधी आज सहस्त्रावधी निरुपद्रवी सत्याग्रहींना इतर कोट्यावधी निरुपद्रवी, बेपर्वा, परावलंबी, आळशी किंबहुना दुराचारी हिंदवासियांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून बळी देण्यास सिद्ध झाले आहेत ना ? ह्यातच अखेर क्षत्रिय धर्माचा जयजयकार आहे. श्रोते हो, तुम्हीही हा नुसत्या शब्दानेच जयजयकार करणार की तो क्षात्रधर्म स्वतः आचरून श्री शिवरायाचे व गांधींचे अनुकरण करणार हे तुमचे तुम्ही ठरवा. उपदेशाचा अधिकार माझा नाही. मी एवढेच सांगतो की, जोवर जुलूम आहे तोवर तरवारीची जरुरी आहे. नांगराचा फाळा आणि तरवारीचे पाते ही दोन्ही माझ्या मताने केवळ शेतकीचीच औते होत. आजकाल दोन्हींचीही जरुरी आहे.

चार्लस मँकेकृत एक इंग्रजी लावणी मी एका शाळेच्या क्रमिक पुस्तकात वाचली. तिच्यात ट्यूबलकेन नावाच्या एका हबशाचा (लोहाराचा) पश्चात्ताप कवीने वर्णिला आहे. ह्या घडशाने, प्रथम पाणीदार वर्च्या व तरवारी केल्या. तेव्हा क्षत्रियाने त्याचा  मोठा गौरव केला. पुढे त्याच तरवारीचा व भाल्याचा उपयोग आततायी शठांनी चालविला. तेव्हा त्या घडशाला मोठा पश्चात्ताप झाला. म्हणून त्याने नांगराचे सुंदर फाळ तयार केले. पण अखेरच्या चरणात कवी म्हणतो—
But while oppression lifts his head or a tyrant would be lord. Through we may them him (cain). For will not forget the sword ‘I’ ” (Plough).

भावी शिक्षकांनो पहा, तुम्ही येथून पुढे तुमच्या अध्ययन-अध्यापन कार्यात तरवारीला विसरून चालावयाचे नाही. तुम्ही विसरल्यामुळे आमच्या हातातल्या तरवारी गेल्याच, फाळही चालले, केरसुण्या मात्र कायमच्या उरतील.

कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला उपदेश देवाचा व आपला संबंध

आपल्याला व्यवहारामध्ये नित्य असा अनुभव येतो की पुष्कळांचा व देवाचा संबंध साधारणपणे दोन प्रकारचा असतो. हे दोन्ही संबंध उदाहरणाने चांगल्या रीतीने दाखविता येतील म्हणून केवळ उदाहरणासाठीच मी असे म्हणतो की, परमेश्वराचा व मनुष्याचा संबंध साधारणपणे एकादी तरूण स्त्री व तरूण पुरूष ह्यांच्या संबंधासारखा असतो. एवढे म्हटल्याने आपल्याला माझ्या विचारांची काहीच कल्पना होणे नाही. म्हणून थोडे अधिक स्पष्टीकरण करितो. आमच्या स्त्रिया जात्याच लाजाळू असतात, त्यांच्यात जो विनय असतो, जो लाजाळूपणा असतो, त्याचा अतिरेक न झाला तर तो त्यांस फारच शोभतो. विनयाचा, लाजाळूपणाचा अतिरेक म्हणजे कोणाच्या वा-यास केव्हाच उभे न राहणे व कोणी कितीही सदबुद्धीने, कितीही चांगल्या रीतीने काहीही विचारिले तरी त्याचे उत्तर न देता दूर उभे राहणे किंवा दूर निघून जाणे. विनयाच्या ह्या अतिरेकाशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आमच्या स्त्रियांमध्ये सर्वसाधारण सा जो विनय आढळून येतो तो हा की, पर पुरूषाशी अगदी सरळ असे दोन शब्द बोलण्यासही लज्जा वाटावयाची. त्याचा व आपला काही संबंध नाही, ओळख नाही, परिचय नाही, तो आपणांस अगदीच परका म्हणून त्याच्याशी एक अक्षरही बोलावयचे नाही, ही एक स्थिती. ह्या स्थितीचे कारण परिचयाचा अभाव. दुसरी जी स्थिती तिचे कारण अति परिचय. स्त्री-पुरूषाचा अशा संबंध की स्त्रीला पुरूषाच्या बद्दल काही आदर नाही, त्याच्याविषयी काही पूज्यभाव नाही. त्याच्याशी वाटेल त्या वल्गना करण्यास काही वाटत नाही. त्याचा पाणउतारा करण्यात आपल्या हातून काही अनुचित कार्य घडत आहे ह्याची जागृती नाही. त्याला आपली उत्तरे टोचतील ह्याची पर्वा नाही. हा संबंध आपण अत्यंत त्याज्य असे समजतो, हे ठीकच आहे, परंतु असा संबंध आपल्या लक्षात कधी कधी येऊन चुकतो ह्यात काही संशय नाही. खरे पाहता ह्या दोन अपूर्ण संबंधांहून निराळा एक तिसरा पूर्ण संबंध आहे. स्त्री व पुरूष ह्यांचा संबंध एक तर पहिल्या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अपरिचयाचा किंवा दुस-या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अतिपरिचयाचा असाच सला पाहिजे असे नाही. त्यांच्यात तिसरा एक पूर्ण परिचयाचा दैवी संबंध असू शकतो. त्याच्या योगे परस्परांस परस्परांची योग्यता कळून चुकते. कोण कोणाहून श्रेष्ठ आहे, कोणामध्ये कोणते गुण अधिक आहेत, त्याची छाप कोणावर कशी पडते हे जाणणारा, एक दुस-यावर निर्मळ प्रेम करणारा, पण आदराने वागणारा असा तो संबंध असतो. असा संबंध जडला म्हणजे तेथे प्रेमाचे सारखे वर्धन होत असते. विचारास विचार जुळतात. आणि तो संबंध केवळ स्वर्गीय संबंध होय. असा संबंध असणा-या व्यक्ती मग पतिपत्नी असोत किंवा मित्रमित्र असोत.

आता जे आम्ही आपल्याला प्रार्थनासमाजाचे म्हणून म्हणवितो त्या आम्हांमध्ये पहिल्या दोन्ही उदारणांत दाखविलेली स्थिती नसली पाहिजे. ती आमच्यात न यावी म्हणून आम्ही फार जपले पाहिजे. पण ह्या दोन्ही प्रकारचा आम्हांस केव्हाच अनुभव येत नाही असे आपल्याला म्हणता यावयाचे नाही. देव अत्यंत करणाघन, दयाघन, मग त्याच्या जवळ जावयास आम्हांला लाज का वाटावी? आमचे मन का कचरावे? पण, प्रार्थना करा असे म्हटले असता टाळाटाळी करणारे व उघडपणे नाही म्हणणारे तरूण व प्रौढ आपल्याला आढळत असतील, मला आढळलेही आहेत व नित्य आढळतात.

प्रार्थना करण्यास केव्हाही तयार न होणे म्हणजे काय तर देवापुढे जाण्यास लाजणे होय. माझा व ह्या मनुष्याचा काही परिचय नाही, त्याचे नाव फार तर मी इतरांच्या तोंडून ऐकलेले. त्याच्यापाशी मी काय बोलू? त्यास मी काय विचारू? हा भाव जसा त्या तरूणीत आढळून येतो व ती त्या माणसाच्या वा-यास उभी राहत नाही, त्यास टाळते, त्याचप्रमामे आमचे कित्येक तरूण करीत असतात. देव प्रेमाचे भातुके हाती घेऊन प्रेमाने आम्हांला पाचारीत असता आम्ही त्याला पाठमोरे होतो, त्याच्या अंकी बसून त्याच्या प्रेमाचा लाभ घेण्यास आम्ही धजत नाही. हा असला संबंध आम्ही टाळला पाहिजे. देवापाशी जाण्यास आम्ही लाजणे म्हणजे आम्ही आमच्या हानीस कारण होणे होय हे लक्षात ठेविले पाहिजे.

परंतु देवाशी अतिपरिचय होणे म्हणजे काय ते कदाचित तत्क्षणी आपल्या लक्षात यावयाचे नाही. कारण देवशी आमचा परिचय घडावयाची जेथे मारामार तेथे अतिपरिचय होऊन पुढे अवज्ञा कशी होणार? होय, आमचा देवाशी अतिपरिचय होतो आणि त्यामुळे त्याची आम्ही अवज्ञाही करतो, त्याचा व आमचा काय संबंध आहे हे अगदी विसरतो. त्याची योग्यता विसरतो व त्यास आम्ही केवळ निर्जीवाहून निर्जीव दुर्बळाहून दुर्बळ असा करून टाकितो आणि हे केवळ संवयीच्या जोरावर आम्ही करीत असतो. कल्पना करा की एकाद्या माणसाला रोज प्रार्थना करण्याची, भजन करण्याची सवय आहे असा मनुष्य त्याच्या मनाची तयारी नसली, मन अत्यंत मलिन, पापविचारानी भरलेले असे जरी असले तरी देवापाशी जाऊन त्याची स्तुती, त्याची प्रार्थना करण्यास, त्याचा म्हणवून घेण्यास मागेपुढे पहात नाही आपले कुटिल विचार सर्वज्ञ देव जाणून आहे, आपले अशुद्ध अंत:करण त्यास चांगले दिसत आहे, आपला वरपांगी व बेगडी भक्तिभाव त्यास केव्हाच कळून चुकलेला आहे हे तो विसरतो, व सात्विक भक्तिभावाचा आव आणून आपणा स्वत:स फसवून घेतो. अशा वेळी सर्वज्ञ, सर्वसमर्थ, जो देव त्यास मूढाहून मूढ, दुबळ्याहून दुबळा तो करून टाकतो नाही तर काय? हा मनुष्य आधी किती तरी दुबळा आणि मलिन, पण ती मलिन स्थिती देवाला न कळण्यासाठी वर बेमुर्वतीचे वर्तन असे मी समजतो. आम्ही प्रार्थनासमाजिक, जे आम्ही वारंवार प्रार्थना व भजन करणारे त्यांच्यात हा दांभिक भाव शिरण्याचा संभव आहे. म्हणून आम्ही त्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवावर आमचे प्रेम पाहिजे. पण, त्याच्यासंबंधाने आमच्या ठिकाणी आदरभाव पाहिजे, भीतीही पाहिजे. एकादे चांगल्या वळणातील मूल पहा, त्याचे आपल्या आईवर प्रेम नसते काय? बापावरही प्रेम असते. ते मूल आईबापाशी फार सलोख्याने वागते. पण, त्याच्या संबंधाने त्याचे ठिकाणी किती आदर, त्यांचा त्यास किती वचक असतो. तेच लाडाने बिघडलेले किंवा इतर वाईट मुलांच्या सहवासाने उद्दाम बनलेले मूल घ्या. त्यास आपल्या आईबापासंबंधाने काही क्षिती वाटत नाही. त्यांच्या समोर ते वाटेल ती ढोंगे करील, खोटे बोलून वेळां मारून नेईल, सर्व काही करील. आमचा व देवाचा संबंध असा अवज्ञा करण्यापर्यंत केव्हाही येऊ नये. तो अनंत, आम्ही सान्ताहून सान्त, तो सर्वज्ञ, आम्ही आपणास अल्पज्ञ म्हणविणे म्हणजेही आम्ही आमच्या ज्ञानाची घमेंड दाखविणे होय. तो सर्वसमर्थ आणि आम्ही त्याचे प्रेमास अपात्र, तो न्यायी आणि आम्ही अन्यायाकडे सदा धावणारे असा त्याच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदभाव आहे. हा भेदभाव ओळखून, त्यास वचकून असले पाहिजे. त्याच्यापुढे जावयाचे तर अंत:करण शुद्ध करून, मलिन भाव शुद्ध करून आम्ही गेले पाहिजे. निदान अंत:करण मलिन आहे हे त्याजपाशी अनुतापपूर्वक कबूल तरी केले पाहिजे. त्या मलिन स्थितीवर जाणूनबुजून आवरण घालण्याचा तरी प्रयत्न होता कामा नये.

  1. कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व प्रगती पत्रातील अहवाल
  2. कै. डॉ. संतूजी रामजी लाड
  3. कै. अण्णासाहेब शिंदे चरित्र व कार्य
  4. कालियामर्दन
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
  • 33
Page 29 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी