कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला उपदेश देवाचा व आपला संबंध

आपल्याला व्यवहारामध्ये नित्य असा अनुभव येतो की पुष्कळांचा व देवाचा संबंध साधारणपणे दोन प्रकारचा असतो. हे दोन्ही संबंध उदाहरणाने चांगल्या रीतीने दाखविता येतील म्हणून केवळ उदाहरणासाठीच मी असे म्हणतो की, परमेश्वराचा व मनुष्याचा संबंध साधारणपणे एकादी तरूण स्त्री व तरूण पुरूष ह्यांच्या संबंधासारखा असतो. एवढे म्हटल्याने आपल्याला माझ्या विचारांची काहीच कल्पना होणे नाही. म्हणून थोडे अधिक स्पष्टीकरण करितो. आमच्या स्त्रिया जात्याच लाजाळू असतात, त्यांच्यात जो विनय असतो, जो लाजाळूपणा असतो, त्याचा अतिरेक न झाला तर तो त्यांस फारच शोभतो. विनयाचा, लाजाळूपणाचा अतिरेक म्हणजे कोणाच्या वा-यास केव्हाच उभे न राहणे व कोणी कितीही सदबुद्धीने, कितीही चांगल्या रीतीने काहीही विचारिले तरी त्याचे उत्तर न देता दूर उभे राहणे किंवा दूर निघून जाणे. विनयाच्या ह्या अतिरेकाशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आमच्या स्त्रियांमध्ये सर्वसाधारण सा जो विनय आढळून येतो तो हा की, पर पुरूषाशी अगदी सरळ असे दोन शब्द बोलण्यासही लज्जा वाटावयाची. त्याचा व आपला काही संबंध नाही, ओळख नाही, परिचय नाही, तो आपणांस अगदीच परका म्हणून त्याच्याशी एक अक्षरही बोलावयचे नाही, ही एक स्थिती. ह्या स्थितीचे कारण परिचयाचा अभाव. दुसरी जी स्थिती तिचे कारण अति परिचय. स्त्री-पुरूषाचा अशा संबंध की स्त्रीला पुरूषाच्या बद्दल काही आदर नाही, त्याच्याविषयी काही पूज्यभाव नाही. त्याच्याशी वाटेल त्या वल्गना करण्यास काही वाटत नाही. त्याचा पाणउतारा करण्यात आपल्या हातून काही अनुचित कार्य घडत आहे ह्याची जागृती नाही. त्याला आपली उत्तरे टोचतील ह्याची पर्वा नाही. हा संबंध आपण अत्यंत त्याज्य असे समजतो, हे ठीकच आहे, परंतु असा संबंध आपल्या लक्षात कधी कधी येऊन चुकतो ह्यात काही संशय नाही. खरे पाहता ह्या दोन अपूर्ण संबंधांहून निराळा एक तिसरा पूर्ण संबंध आहे. स्त्री व पुरूष ह्यांचा संबंध एक तर पहिल्या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अपरिचयाचा किंवा दुस-या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अतिपरिचयाचा असाच सला पाहिजे असे नाही. त्यांच्यात तिसरा एक पूर्ण परिचयाचा दैवी संबंध असू शकतो. त्याच्या योगे परस्परांस परस्परांची योग्यता कळून चुकते. कोण कोणाहून श्रेष्ठ आहे, कोणामध्ये कोणते गुण अधिक आहेत, त्याची छाप कोणावर कशी पडते हे जाणणारा, एक दुस-यावर निर्मळ प्रेम करणारा, पण आदराने वागणारा असा तो संबंध असतो. असा संबंध जडला म्हणजे तेथे प्रेमाचे सारखे वर्धन होत असते. विचारास विचार जुळतात. आणि तो संबंध केवळ स्वर्गीय संबंध होय. असा संबंध असणा-या व्यक्ती मग पतिपत्नी असोत किंवा मित्रमित्र असोत.

आता जे आम्ही आपल्याला प्रार्थनासमाजाचे म्हणून म्हणवितो त्या आम्हांमध्ये पहिल्या दोन्ही उदारणांत दाखविलेली स्थिती नसली पाहिजे. ती आमच्यात न यावी म्हणून आम्ही फार जपले पाहिजे. पण ह्या दोन्ही प्रकारचा आम्हांस केव्हाच अनुभव येत नाही असे आपल्याला म्हणता यावयाचे नाही. देव अत्यंत करणाघन, दयाघन, मग त्याच्या जवळ जावयास आम्हांला लाज का वाटावी? आमचे मन का कचरावे? पण, प्रार्थना करा असे म्हटले असता टाळाटाळी करणारे व उघडपणे नाही म्हणणारे तरूण व प्रौढ आपल्याला आढळत असतील, मला आढळलेही आहेत व नित्य आढळतात.

प्रार्थना करण्यास केव्हाही तयार न होणे म्हणजे काय तर देवापुढे जाण्यास लाजणे होय. माझा व ह्या मनुष्याचा काही परिचय नाही, त्याचे नाव फार तर मी इतरांच्या तोंडून ऐकलेले. त्याच्यापाशी मी काय बोलू? त्यास मी काय विचारू? हा भाव जसा त्या तरूणीत आढळून येतो व ती त्या माणसाच्या वा-यास उभी राहत नाही, त्यास टाळते, त्याचप्रमामे आमचे कित्येक तरूण करीत असतात. देव प्रेमाचे भातुके हाती घेऊन प्रेमाने आम्हांला पाचारीत असता आम्ही त्याला पाठमोरे होतो, त्याच्या अंकी बसून त्याच्या प्रेमाचा लाभ घेण्यास आम्ही धजत नाही. हा असला संबंध आम्ही टाळला पाहिजे. देवापाशी जाण्यास आम्ही लाजणे म्हणजे आम्ही आमच्या हानीस कारण होणे होय हे लक्षात ठेविले पाहिजे.

परंतु देवाशी अतिपरिचय होणे म्हणजे काय ते कदाचित तत्क्षणी आपल्या लक्षात यावयाचे नाही. कारण देवशी आमचा परिचय घडावयाची जेथे मारामार तेथे अतिपरिचय होऊन पुढे अवज्ञा कशी होणार? होय, आमचा देवाशी अतिपरिचय होतो आणि त्यामुळे त्याची आम्ही अवज्ञाही करतो, त्याचा व आमचा काय संबंध आहे हे अगदी विसरतो. त्याची योग्यता विसरतो व त्यास आम्ही केवळ निर्जीवाहून निर्जीव दुर्बळाहून दुर्बळ असा करून टाकितो आणि हे केवळ संवयीच्या जोरावर आम्ही करीत असतो. कल्पना करा की एकाद्या माणसाला रोज प्रार्थना करण्याची, भजन करण्याची सवय आहे असा मनुष्य त्याच्या मनाची तयारी नसली, मन अत्यंत मलिन, पापविचारानी भरलेले असे जरी असले तरी देवापाशी जाऊन त्याची स्तुती, त्याची प्रार्थना करण्यास, त्याचा म्हणवून घेण्यास मागेपुढे पहात नाही आपले कुटिल विचार सर्वज्ञ देव जाणून आहे, आपले अशुद्ध अंत:करण त्यास चांगले दिसत आहे, आपला वरपांगी व बेगडी भक्तिभाव त्यास केव्हाच कळून चुकलेला आहे हे तो विसरतो, व सात्विक भक्तिभावाचा आव आणून आपणा स्वत:स फसवून घेतो. अशा वेळी सर्वज्ञ, सर्वसमर्थ, जो देव त्यास मूढाहून मूढ, दुबळ्याहून दुबळा तो करून टाकतो नाही तर काय? हा मनुष्य आधी किती तरी दुबळा आणि मलिन, पण ती मलिन स्थिती देवाला न कळण्यासाठी वर बेमुर्वतीचे वर्तन असे मी समजतो. आम्ही प्रार्थनासमाजिक, जे आम्ही वारंवार प्रार्थना व भजन करणारे त्यांच्यात हा दांभिक भाव शिरण्याचा संभव आहे. म्हणून आम्ही त्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवावर आमचे प्रेम पाहिजे. पण, त्याच्यासंबंधाने आमच्या ठिकाणी आदरभाव पाहिजे, भीतीही पाहिजे. एकादे चांगल्या वळणातील मूल पहा, त्याचे आपल्या आईवर प्रेम नसते काय? बापावरही प्रेम असते. ते मूल आईबापाशी फार सलोख्याने वागते. पण, त्याच्या संबंधाने त्याचे ठिकाणी किती आदर, त्यांचा त्यास किती वचक असतो. तेच लाडाने बिघडलेले किंवा इतर वाईट मुलांच्या सहवासाने उद्दाम बनलेले मूल घ्या. त्यास आपल्या आईबापासंबंधाने काही क्षिती वाटत नाही. त्यांच्या समोर ते वाटेल ती ढोंगे करील, खोटे बोलून वेळां मारून नेईल, सर्व काही करील. आमचा व देवाचा संबंध असा अवज्ञा करण्यापर्यंत केव्हाही येऊ नये. तो अनंत, आम्ही सान्ताहून सान्त, तो सर्वज्ञ, आम्ही आपणास अल्पज्ञ म्हणविणे म्हणजेही आम्ही आमच्या ज्ञानाची घमेंड दाखविणे होय. तो सर्वसमर्थ आणि आम्ही त्याचे प्रेमास अपात्र, तो न्यायी आणि आम्ही अन्यायाकडे सदा धावणारे असा त्याच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदभाव आहे. हा भेदभाव ओळखून, त्यास वचकून असले पाहिजे. त्याच्यापुढे जावयाचे तर अंत:करण शुद्ध करून, मलिन भाव शुद्ध करून आम्ही गेले पाहिजे. निदान अंत:करण मलिन आहे हे त्याजपाशी अनुतापपूर्वक कबूल तरी केले पाहिजे. त्या मलिन स्थितीवर जाणूनबुजून आवरण घालण्याचा तरी प्रयत्न होता कामा नये.