1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

ईश्वर आणि विश्वास

ईश्वर

मानवोन्नतिशास्त्र (Anthropology) ज्यांनी पाहिले असेल, त्यांना ५००० वर्षांपूर्वीपासून आतापर्यंत धर्माची प्रगती कशी होत आली आहे, हे कळून येईल. एवढ्या काळात जड जगत् जशाचे तसेच राहिले आहे. जी माती पूर्वी तांबडी होती ती आताही तांबडीच आहे, जी काळी होती ती आता तशीच आहे. जो दगड पूर्वी जितका कठीण होता तो तितकाच आता आहे. मनुष्येतर प्राणीही बहुतेक त्याच स्थइतीत आहेत. पण मनुष्यप्राण्याने इतक्या अवधीत किती आघाडी मारिली आहे! भौतिक कला, मानसिक विद्या आणि आत्मिक उन्नती ही ह्या एका प्राण्याने किती तरी संपादिली आहेत पहा.

हे जे ऐश्वर्य आणि ही जी संपत्ती मनुष्याने मिळविली आहे त्या सर्वांत श्रेष्ठ दर्जाची संपत्ती म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची गूढ शक्ती, की जिच्यामुळे अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण होऊन चालली आहेत... त्याच्यासंबंधी मनुष्याने आपल्या ज्या कल्पना, भावना व सिद्धांत केले आहेत, ते होत. ईश्वर म्हटल्याबरोबर काय काय विचार, विकार, ईर्षा, इ. उदभवतात! ह्या संपत्तीशी दुस-या कशाचीही नुसती तुलना देखील करणे शोभत नाही.

हा जो आपल्याजवळ अपूर्व संपत्तीचा संचय आहे, तो जशाचा तसाच पूर्वीपासून मिळालेला आहे असे नाही. स्वत: ईश्वर जरी उत्क्रांतिनियमाच्या बाहेर आहे, तरी त्याने आपल्यासंबंधी ज्ञान मनुष्यास एकदम जाहीर केलेले नसून ते तो उत्क्रांतिनियमाप्रमाणे हळूहळूच देत आहे. पृथ्वीच्या नकाशाकडे पाहिले असता दिसून येईल की, भूमध्यरेखेपासून उत्तरेकडील ४० अक्षांशांच्या दरम्यान जे इजिप्त, अँसिरिया, बॅबिलोनिया, इराण, हिंदुस्थान, चीन, जपान, मेक्सिको आणि पेरू इ. प्राचीन देश आणि राष्ट्रे होऊन गेली, ह्यांतच मनुष्यजातीच्या हल्लीच्या सर्व सुधारणांची उत्पत्ती झाली आहे, असे उपलब्ध इतिहासावरून दिसून येते. ह्या चाळीस अक्षांशांच्या समशीतोष्ण कटिबंधात हे सर्व देश दिसून येते. ह्या चाळीस अक्षांशांच्या समशीतोष्ण कटिबंधात हे सर्व देश असल्यामुळे, युरोप व आफ्रिकेत गहू, आशियात तांदूळ आणि अमेरिकेत मका ही मनुष्याच्या सुस्थितीस आवश्यक धान्ये उत्पन्न होऊन त्यांच्याबरोबरच सुधारणांचीही लागवड होणे शक्य झाले. ह्यावरून इतरांबरोबरच ईश्वरासंबंधी ज्ञानालाही भौतिक साधनांची कशी आवश्यकता आहे, हे दिसून येईल. फार प्राचीन काळी अर्धवट रानटी माणसांच्या ज्या साध्याभोळ्या धर्मसमजुती आधुनिक शोधामुळे व शास्त्रीय उपकरणांच्या योगे आम्हांला माहीत होऊ लागल्या आहेत, त्यांच्याशी आमच्या स्वत:च्या सुसंस्कृत समजुती ताडून पाहता हा ईश्वरी ज्ञानाचा विकास होत असलेला दिसून येईल.

मनुष्य मेला असता त्याच्या आत्म्याला बाहेर जाण्याला वाट करून देण्यास प्रेताच्या टाळूस वाटोळे भोक करण्याची चाल काही रानटी लोकांत असावी अशी काही प्रेतांच्या प्रस्तरभूत सांगाड्यावरून व इतर खुणांवरून अटकळ होते. मस्तकात प्राण नावाची कल्पना आपल्या योगशास्त्रातही आहे. “इस बंगलेकू नऊ दरवाजे दसवी खिडकी खोल” असा जो कबीरजींचा उल्लेख आहे, तोही ह्या मस्तकातील खिडकीसंबंधी होय. ह्यात रहस्य इतकेच की आत्मतत्त्व म्हणून काही आपल्यात आहे आणि बाहेरही आहे आणि त्याचा मिलाफ व्हावयाचा आहे ही जी धार्मिक कल्पना ती अनेक प्रकारच्या समजुतींच्या द्वारापूर्वीपासून सारखी परिणत होत आहे. तसेच आकाश, वायू, पर्जन्य, महासागर, सूर्य, इ. सृष्ट महाविभूती निरनिराळ्या दैवते मानून त्यांची पूजा करण्याची प्रवृत्ती जशी ग्रीक लोकांत आणि हिंदुस्थानात होती तशीच नव्या खंडातील मेक्सिको आणि पेरू देशांतही असलेली शोधकास आढळून आली, इतकेच नव्हे, तर मेक्सिकोच्या जुन्या देवळातील सूर्याच्या मूर्तीचे जे चित्रवर्णन केलेले आहे, ते तर मराठी जुन्या तिस-या पुस्तकातील सूर्याच्या चित्राची हुबेहूब आठवण करून देते. ही अनेक दैवते नाहीशी होऊन गेली, तिचाही प्रकार चहूंकडे सारखाच दिसून येतो.

असो. ह्याप्रमाणे मनुष्यप्राणी ईश्वराची कोणत्या ना कोणत्या त-हेने तरी भावना केल्यावाचून राहिला नाही. इतकेच नव्हे, तर ईश्वरासंबंधी त्याची भावना उत्तरोत्तर शुद्धच होत गेली आहे व पुढे ह्याहूनही शुद्ध होत जाणार आहे. किंबहुना ईश्वराला भावणे हाच मनुष्यपणा आहे.
असन्नेव स भवति| असदब्रह्मेति वेद चेत्| अस्ति ब्रह्मेति चेद्वेद|(तैतिरीयोपनिषद २.६)

ब्रह्म नाही असे म्हणणारा स्वत: आपणच नाही असा होतो. ब्रह्माला आहे असे जाणण्यानेच जाणणा-या स्वत:ला अस्तित्व येते. मननशील असणे हाच मनुष्याचा धर्म. तो नाहीसा झाला म्हणजे मनुष्याचा मनुष्यपणा नाहीसा होऊन तो नुसता प्राणीरूपाने उरतो. असा वरील श्रुतिवाक्याचा भाव आहे. तेव्हा ईश्वरासंबंधी काही तरी भावना मनुष्यमात्रामध्ये असलीच पाहिजे, ही गोष्ट निर्विवाद आहे.

मानवोन्नतिशास्त्र किंवा तुलनात्मक धर्मशास्त्र ह्यांचा उद्देश ईश्वर आहे की नाही हा प्रश्न ठरविण्याचा नाही, तर ईश्वरभावनेची शुद्धी कसकशी होत गेली हे दाखविण्याचा आहे. आणि ह्या शुद्धीची मुख्य दिशा ही आहे की, ईश्वर हा कोणी शरीरविशिष्ट व्यक्ती नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे, अशी मानवजातीची मती होत चालली आहे. म्हणजे थोडक्यात सांगावयाचे तर ईश्वर हा भोगायतन नसून केवळ गुणाश्रय आहे. मनुष्यही स्वत: गुणाश्रय आहे, परंतु त्याच्या गुणाला शरीराची अपेक्षा आहे तेव्हा ह्या त्याच्या दोषामुळे तो कितीही ज्ञानी झाला तरी तो आपल्या स्वत:चा देहभाव सूक्ष्म मानाने नकळत का होईना, ईश्वरावर आरोपितोच. तो देहभाव (Anthropomorphism) पूर्ण नाहीसा करून ईश्वर हा केवळ गुणाश्रय आहे, असे जाणणे ही त्याविषयी सम्यग्भावना होय. म्हणजे ईश्वर आमच्यासारखा सुखी किंवा दु:खी नसून केवळ सुखरूपच आहे, आमच्याप्रमाणे द्याळू किंवा निर्दय नसून दयेचा प्रेरक आहे, आमच्यासारखा प्रेमी किंवा द्वेषी नसून प्रेमाचा प्रवर्तक आहे, हे आम्ही उत्तरोत्तर अधिक जाणिले पाहिजे.

ह्या ठिकाणी असा एक आक्षेप येण्याचा फार संभव आहे की ईश्वर जर सर्व गुणांचा प्रवर्तक आहे, तर तो सदगुणांचा असावा तसाच दुर्गुणांचा असला पाहिजे. चांगल्या गुणाला मात्र ईश्वर कारण आणि वाईटाला मनुष्य कारण असे म्हणणे म्हणजेच ईश्वरावर ही मोठी मेहरबानीच करू पाहणे होय. ह्यावर थोडा विचार केल्यास कळून चुकेल की सदगुण आणि दुर्गुण ह्या दोन भिन्न परस्परविरोधी स्थिती मुळीच नाहीत. जे काय आहेत ते गुणच आहेत आणि ते सर्व मंगलच आहेत. उदारणार्थ, मनुष्य प्रेमामुळे दुस-यावर उपकार करतो व लोभामुळे दुस-याला अपकार करतो असे दिसते. पण प्रेम आणि लोभ हे परस्पर विरोधी पदार्थ नाहीत. तर उत्क्रांतीच्या निरनिराळ्या पायरीवरचे गुण असून दोन्ही सत्कार्याची साधनेच आहेत. प्राणिमात्रांनी आत्मसंरक्षण करावे, ह्यासाठी ईश्वर लोभाचा प्रवर्तक होतो; आत्मसंरक्षणाचे खालचे कार्य चांगले स्थापित झाल्यावर त्याहून उच्च दर्जाचे जे परहितपोषण-उत्क्रांतीचे कार्य त्यासाठी प्रेमाचा प्रवर्तक ईश्वरच होतो. आपण मात्र वरच्या पायरीवर पोहोचूनही वरच्या प्रेरणांना न जुमानता खालच्या प्रेरणांना वश झालो, तर आपल्याला दिलेल्या स्वतंत्रतेचा आपण दुरूपयोग केला असे होते. ईश्वर दुर्गुणांचा प्रवर्तक होत नाही. कारण दुर्गुण असा कोणताच नाही. ह्याचप्रमाणे शौर्य आणि भीती, सहिष्णुता आणि क्रोध, जितेंद्रियता आणि काम, ह्या सर्व गुणांचे प्रयोजन समजावे. हे भिन्नभिन्न दिसणारे गुण एकाच पायरीवरचे नव्हेत. उत्क्रांति-कार्यासाठी ह्यांची शुभ परंपरा सत्त्वाचा प्रवर्तक जो परमेश्वर त्यानेच लावून दिली आहे. आणि वाढीच्या मानाने प्राणिमात्रांना ईश्वराने अधिकार आणि स्वतंत्रता ही कशी दिली आहेत ह्याचा अनुभवही ज्याचा त्यालाच आहे. ह्यासंबंधी इतरांनी वाच्यता करण्याची जरूरी नाही आणि करून फळही नाही. एवंच ईश्वर सत्त्वाचा प्रवर्तक आहे ह्या श्रुतिवाक्याला बाध येत नाही.

विश्वास ईश्वर सत्त्वाचा प्रेरक आणि प्रवर्तक कसा आहे ह्याचा आपण इतका वेळ विचार केला. आता त्याच्या आमच्यामधील संबंध जो विश्वासाचा त्याकडे वळू.

ईश्वराचा व आपला संबंध बुद्धीच्यापेक्षा विश्वासाच्याद्वारे अधिक जडतो. इतकेच नव्हे, तर बुद्धीच्यामुळे हा संबंध केव्हा केव्हा शिथिल होतो असे दिसून येते. बुद्धी आणि विश्वास ह्यांतील फरक थोडक्यात सांगावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की, बुद्धी म्हणजे पुष्कळ प्रयत्नानंतर पुष्कळ सामग्रीच्या साहाय्याने अल्प ज्ञान करून देणारी शक्ती आणि विश्वास म्हणजे काहीच प्रयत्न न करता अल्पशा सामग्रीने पुष्कळसे ज्ञान करून देणारी शक्ती होय. अनेक शास्त्रांच्या पुष्कळ साधनांनी आणि मोठ्या अविश्रांत श्रमाने मनुष्याला बराच अनुभव आला आहे, तरी विश्वाचे ठोकळ आणि यथार्थ ज्ञान काय झाले हे पाहू गेले असता साधनांच्या मानाने सिद्धी फारच अल्प झालेली दिसून येईल. पण माणसामध्ये विश्वास म्हणून एक अधिक मोलाची आणि नवलाची शक्ती आहे. विश्वामध्ये सत्त्वाचा, शुभाचा आणि मांगल्याचा प्रसार करणारी ईश्वर ही शक्ती भरली आहे, हे ज्ञान प्राचीन काळापासून कमी अधिक मानाने कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे अवगत झाले आहेच. थोडा कोठे एक विशेष प्रकारचा अंगस्पर्श होतो न होतो, तोच नूतन बालकाचा आईवर केवढा दृढ आणि कायमचा विश्वास बसतो! थोडी खुणेला खूण पटली की तरूणी आपल्या माहेराच सर्व वारसा सोडून देऊन परक्या तरूणावर आपल्या सर्व आयुष्याचा भार टाकते! ही विश्वासाची जादू होय. “आकारैरिंगितैर्गत्यागृह्यतेSन्तर्गतं मन:|” मनुष्याच्या आतला मतलब समजण्याला, आकार, हावभाव, बसणे, उठणे इ. वरून सहजच उपजणारा विश्वास हा कारण होतो. येथे तर्काची प्रमाणे पंगू पडतात आणि मनुष्याप्रमाणेच अखिल विश्वाचा मतलब समजण्यालाही बुद्धीच्या कृत्रिम खटपटीपेक्षा उपजत विश्वासच कामाला येतो. कारण “तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा| पुरवू खुणे खुणा जाणतसे||”

बुद्धी आणि विश्वास ह्यांमध्ये दुसरा एक विशेष फरक आहे तो असा. विश्वामध्ये सत्त्वाचा प्रवर्तक ईश्वर आहे असे केवळ अस्तित्वबोधक ज्ञान बुद्धीच्याहीद्वारे मिळू शकते. हल्लीच्या काळी शिक्षण आणि संसाराच्या इतर सोयी पुष्कळ सवंगल्या असल्यामुळे ब-याच सुशिक्षित लोकांना आपल्या बुद्धीची थोडीशी हालचाल करून, थोडेसे तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन करून, ईश्वरासंबंधी वरील अस्तित्वबोधक ज्ञान मिळविता येते आहे. पण अशा सुशिक्षितांना त्यांच्या सुखवस्तू स्थितीत त्यांच्या ह्या सुलभ ज्ञानामुळे फारसा उपद्रव होत नाही, किंवा साहाय्यही पोहोचत नाही. नित्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहारात सत्याचा आग्रह धरून रहावयाला त्यांचे हे आयते ज्ञान त्यांना भाग पाडीत नाही. किंवा भाग पडले असता त्यांना धीरही देत नाही, येथे विश्वासाचे काम आहे. ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही, तर तो सत्याचा आशि शुभाचा प्रवर्तक आहे. म्हणूनच मी सत्याचा आग्रह धरून राहिलो तर, माझे कितीही हाल झाले तरी हानी-माझी किंवा कोणाचीही-मुळीच होणार नाही, असा विश्वास पाहिजे आहे. अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा आणि निकट संबंध जडतो, बुद्धीने जडत नाही.

माझ्या समाजबंधूंनो, मला आपल्यापुढे हाच मुद्दा विशेष कळकळीने सांगावयाचा आहे. ह्यात नवीन काही नाही आणि ते नको आहे. तुम्ही व मी प्रार्थनासमाजात आलो, येवढ्यावरूनच सर्व ईश्वरावर विश्वास ठेवणारे झालो असे होत नाही. ती गोष्ट आम्ही आमच्या नित्याच्या व्यवहारात कसे वागत असतो ह्यावर अवलंबून आहे. पुष्कळ वेळा तर असे घडते की आम्ही आपल्या व्यक्तीच्या वर्तनावर दुस-यांनी टीका करण्याची वाट देखील पाहत नाही. म्हणजे कोणीतरी समाजावर साधारण टीका केल्याबरोबर आमचा सर्व विश्वास विरघळून जाऊन आम्ही शुष्क होतो. परवाच पुणे येथील मराठा पत्रात एका सन्मान्य गृहस्थाचा एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, प्रार्थना समाजात फारच थोड जीव उरला आहे आणि त्याचे लोकांवर तर मुळीच वजन नाही. गोष्ट खरी असेल. पण अशा टीकेचा आमच्या समजाबंधूंवर भलताच परिणाम होण्याचा संभव आहे म्हणून मला पुढील एक गोष्ट सांगावी असे वाटते.

एकदा एका मोठ्या आगबोटीवरील एक उतारू फार आजारी पडला. तो जगण्याची आशा बहुतेक नाहीशी झाली. शेवटी आगबोटीवरील डॉक्टरांनी रोग्याला नीट तपासून आपली खात्री करून घेतली, आणि स्ट्यूअर्डस लोकांना एकीकडे बोलावून सांगितले की, रोग्यात आता जीव फारच थोडा उरला आहे. तो १० वाजण्याच्या आत खात्रीने मरणार. त्यानंतर त्यास समुद्रात टाकून द्यावे. १० वाजता सांगितल्याप्रमाणे स्ट्यूअर्डस येऊन रोग्यास उचलून नेऊ लागले, रोगी त्यास तसे करू देईना, स्ट्यूअर्डसनी डॉक्टरचे मत कळविले तरी रोगी आपण मेलो आहे हे कबूल करीना. स्ट्यूअर्डसनी त्याला दरडावून विचारले, काय डॉक्टरापेक्षा तुला अधिक कळते काय? एकाद्या विद्वान टीकाकाराने टीका केली, व आमच्यामध्ये जीव आहे की नाही हे विद्वानांपेक्षा आपणांस जास्त समजते. अशावेळी विद्वानांच्या म्हणण्याकडे किंबहुना लोकांच्या दटावणीकडे लक्ष न पोहोचविता आम्ही जिवंत आहो हा विश्वास जतन केला पाहिजे व लोकांनी ढकलून दिले तरी आपण आपल्या नावेतून समुद्रात पडू नये.

ही समाजावरील टीकेची गोष्ट झाली. व्यक्तिविषयक वर्तनावरील टीका झाली तरी आपला विश्वासच जसा कामाला येतो; तसे दुसरे काही येत नाही. पण काही झाले तरी असे दुस-याच्या टीकेचे प्रसंग कमीच येतात. पुष्कळ वेळा आम्हांला स्वत:चीच टीका आणि भीती ह्या नडतात आणि नागवितात. समाजात यावे किंवा न यावे हे ठरविण्याला ईश्वरावरील विश्वासाची इतकी जरूरी भासत नाही. पण वरील आत्मटीका व आत्मभीती ह्यांचे निवारण, सत्त्वप्रवर्तक ईश्वर आपल्या जवळ आहे असा विश्वास आपल्यात अष्टौप्रहर जागत असल्याशिवाय होणे शक्य नाही. एकाद्या कामाचा आरंभ करतेवेळी हा विश्वास असतो, पण अर्ध्या वाटेवर गेलो असता धीर सुटतो, दिशा धुंद होतात.

पॅरीस शहरात सुमारे २०० फूट व्यासाचे एक विशाल चक्र बारीक तारांच्या उंच खांबावर उभे केले आहे. १०-५ माणसे सुखाने बसतील अशा खोल्यासारख्या १००-१५० पेट्या त्या चक्रात बसविल्या आहेत. प्रेक्षक लोक ह्या खोल्यांतून बसले असता हळूहळू ते चक्र फिरत असते. ह्या ठिकाणी फ्रेंच कारागिरांच्या यंत्रकुशलतेची व योजनेची कमाल झाली आहे. मी ह्या एका खोलीत बसून जसजसा हळूहळू वर जाऊ लागलो तसतसा माझा धीर सुटू लागला. किती दिवस तरी ह्या चक्राचा खेळ चालला होता, हे मला माहीत असूनही माझ्याच वेळी ते मोडणार अशी पोरकट भीती मला वाटू लागली. ही भीती केवळ संस्कारजन्य होती. पण तिच्यामुळे त्रास झाला तो काही कमी नव्हता. २०० फूट उंच वर हवेत जेव्हा आमची खोली गेली तेव्हा तर अवस्था फारच कठीण झाली. ह्या चक्राची एक फेरी कशी तरी झाली. पण एफेला टॉवर नावाचा जो ८०० फूट (सर्व जगात उंच) लोखंडी मनोरा आहे, त्याच्या अर्ध्यावर तर चढवेचना. प्रार्थनासमाजाला जो मनोरा चढावयाचा आहे त्याची उंची अनंत आहे, त्यातील सभासदांचा धीर पदोपदी सुटण्याचा संभव आहे. अशा वेळी विश्वासाचे बळ पाहिजे. संस्कारामुळे जी भीती वाटते ती घालवावयाची असल्यास विश्वासाचीच सवय केली पाहिजे.

आत्मोन्नतीचे आणि देशोन्नतीचे पुष्कळ चढाव समाजाला चढावयाचे आहेत. सभासदांचा व्यक्तिश: विश्वास उत्तरोत्तर वाढत जावो आणि ईशभक्ती व लोकसेवा त्यांच्याकडून अधिकाधिक घडो, ही जगच्चालकाजवळ प्रार्थना आहे.

इतिहास संशोधन व भाषाशास्त्र

वाङ्मय व इतिहास ह्यांची जोड जुळणे कठीण आहे. कारण, वाङ्मयाला ज्या गोष्टींची जरूर आहे, त्या गोष्टीं इतिहास बिघडविण्यास कारण होतात. वाङ्मयाला भावनांची जरुरी असते. परंतु इतिहासकार जर भावनाप्रधान असेल, तर त्याची इतिहासकाराची भूमिका सुटून, त्याचे लिखाण लगेच कादंबरी बनते. तसेच भावना नसली, तर वाङ्मय-निर्मिती थांबेल. मला मात्र वाङ्मयाऐवजी इतिहासच जास्त आवडतो.

हल्ली साहित्यामध्ये क्रांती होऊ लागली असून, ती लोकांच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. हल्ली वाङ्मयाची प्रदीर्घता नाहीशी होत चालली असून त्याला लघुत्व प्राप्त होऊ लागले आहे. कै. हरिभाऊ आपट्यांप्रमाणे मोठमोठ्या कादंब-यांचे दिवस केव्हाच संपले असून त्यांची जागा सुटसुटीत गोजिरवाण्या लघुकथांनी व्यापिली आहे. कविताही लहानलहान होत आहेत. आज वीणाकाव्ये लिहिण्याचा प्रघात फार वाढला आहे. पूर्वीच्या १२/१२ तास सबंध रात्रभर चालू राहणा-या नाटकांच्या जागी आता लहानलहान २ तासांत आटोपणारी नाटके आली आहेत. वर्तमानपत्रांची वाढ चांगली झाली आहे परंतु सर्व वर्तमानपत्रे ब्राह्मणांनीच चालविली आहेत. मराठ्यांनी चालविलेली वर्तमानपत्रे नाहीत, ही काही समाधानकारक गोष्ट नाही. स्त्रियांची मासिके असली तरी ती फार थोडी आहेत. सर्व जातींनी चालविलेली वर्तमानपत्रे असल्याशिवाय वाङ्मय प्रातिनिधिक होऊ शकत नाही. ह्या प्रांतात एकही मराठी दैनिक नाही, ही काही चांगली गोष्ट नाही. परंतु, लवकर येथे दैनिक सुरू होईल, अशी मला आशा आहे.

इतिहास संशोधक कसा असावा ?

इतिहास हे एक शास्त्र आहे. इतिहास लेखनाला निःपक्षपातीपणा व निर्विकारता हे गुण अवश्य लागतात. हे गुण जर इतिहासकाराच्या अंगी नसतील (फुट नोट – १८ वे महाराष्ट्र साहित्यसंमेलन-प्रदर्शन-अध्यक्षीय भाषण, महाराष्ट्र-रविवार ता. ३१ डिसेंबर १९३३. नागपूर) तर नदीच्या उगमाशी एकादा घाणेरडा पदार्थ पडला की नदीचे सर्व पाणी बिघडते, तशीच स्थिती तर इतिहासाची होते. आपणाकडे ऐतिहासिक दृष्टी कमी आहे, असा आरोप केला जातो व त्यात बरेच तथ्यही आहे. ग्रीक रोमन लोकांमध्ये ती दृष्टी होती, म्हणूनच त्यांचे इतिहास आज जिवंत आहेत. परंतु, आपल्या प्राचीन इतिहासाचा मात्र पत्ता लागत नाही. आपला प्राचीन इतिहास जागतिक संस्कृतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. परंतु त्याचे संशोधन अद्याप झालेले नाही. अजून हा इतिहास तयार व्हावयाचा आहे. इतिहासाची प्रत्यक्ष साधने—पुरावा संपतो, त्यावेळी भाषाशास्त्राची मदत घ्यावी लागते, व आपला प्राचीन इतिहास लिहिण्यासाठी भाषाशास्त्राची मदत घेणे फार अवश्य आहे.

मराठी ही संस्कृत भाषेपासून उत्पन्न झाली, तिचा वेदाशी संबंध असावा, असे सांगण्यात येते. परंतु, हे म्हणणे चूक आहे. मराठी ही फार जुनी भाषा आहे. ज्ञानेश्वरीच्या वेळची मराठी ही एकाद्या नव्या भाषेसारखी दिसत नाही. त्यावेळी तिच्यामध्ये शब्दसंपत्ती भरपूर असलेली व तिची पूर्ण वाढ झालेली दिसते. त्याअर्थी तिचा उगम फारच जुना असला पाहिजे, असे स्पष्ट दिसते. मराठी ही कानडी व संस्कृत ह्यांच्या सरहद्दीवरची भाषा आहे. संस्कृत व कानडी ह्या सारख्याच जुन्या भाषा आहेत. परंतु, संस्कृतला राजाश्रय मिळाला व तिची भरभराट होऊन, तिने कानडीवर आक्रमण केले व ती भाषा मागे पडली.

विद्यापीठांची निष्क्रियता
हल्ली इतिहास संशोधन चालू आहे. परंतु, अद्याप प्राचीन इतिहासाकडे कोणाचेच लक्ष गेलेले नाही. पुण्याचे भारत इतिहास-संशोधक मंडळाचे संशोधन कितीही महत्त्वाचे असले, तरी ते मराठशाही व पेशवाई ह्यांच्या भोवतीच घोटाळत आहे. यवतमाळच्या शारदाश्रमाचे संशोधन त्यापेक्षा जास्त जुने आहे. परंतु ह्या दोन्ही मंडळांनी आपली हल्लीची चाकोरी सोडून देणे अवश्य नाही काय ? मुंबई व नागपूर विद्यापीठांनीही प्राचीन संशोधनाला मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे ते कर्तव्य आहे. परंतु, आजपर्यंत ह्या बाबतीत विद्यापीठांनी फारसे काही केलेले नाही. ती प्राचीन इतिहासाकडे अधिक लक्ष देतील अशी मी आशा करतो.

इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक चळवळ आणि लिव्हरपूल

सर्व सुधारलेल्या जगातील अत्यंत प्रमुख जे इंग्रजी राष्ट्र, त्याचा गेल्या चार शतकांचा इतिहास वाचून, एकादा परकीय गृहस्थ ह्या राष्ट्राच्या निरनिराळ्या संस्था आणि जीवन प्रत्यक्ष पाहण्यास येथे आल्यावर काही काळाने त्याच्या मनाची विलक्षण स्थिती होते. त्याचे बाहेरचे इतिहाससाध्ययन व येथील प्रत्यक्ष निरीक्षण, ही दोन्ही जर केवळ फावल्या वेळची असतील, तर त्याचा ग्रह ह्या देशासंबंधी फारसा अनुकूल न होता, उलट तो स्वदेशी गेल्यावर सा-या आधुनिक सुधारणेसही नावे ठेवीत सुटण्याचा संभव आहे. त्यात विशेष त्याचा कटाक्ष धर्मसंबंधी असतो. पण वरील अध्ययन व प्रवास निर्मळ मनाने, केवळ शिकण्याच्या व साधनाच्या हेतूने, व कळकळीने कोणत्याही बाजूस तोल न जाऊ देता, घडेल तर मनासच नव्हे तर आत्म्यासही मोठी मिळकत मिळेल अशी माझी खात्री आहे. इतकेच नव्हे तर जगाच्या इतिहासात वेळोवेळी ज्या सुधारणा झाल्या, जी मन्वंतरे घडली आणि एकंदरीत पाहता मानवी प्राण्यांची जी सारखी उन्नतीच होत आहे त्या सर्वांच्या तळाशी, मानवतेचे मुख्य लक्षण जी धर्मबुद्धी, तिचेच मंगल आणि सतत कार्य घडत आहे. ह्या साधारण सिद्धांताची प्रत्यक्ष साक्ष ह्या अध्ययनात व प्रवासात पटते!

सोळाव्या शतकाच्या आरंभी युरोपात जी प्रचंड धर्मक्रांती झाली तिच्यानंतर आधुनिक युगास आरंभ झाला. वरील शतकात इंग्लंडात सुधारलेल्या धर्माची पूर्ण संस्थापना झाल्यावर धर्माचे कार्य संपले असे नव्हे तर उलट तेव्हापासून त्याचा आरंभ झाला. पोपच्या कचाट्यातून इंग्लंड सुटले खरे, म्हणून ते स्वतंत्र झाले असे नव्हे. पोपचे स्थान इंग्लंडच्या राजाने घेतले. संस्थापित चर्च नावाच्या राष्ट्रीय धर्माची संस्थापना झाली. आणि त्या उलट खरे स्वातंत्र्य मिळविण्यास पुन: एक शतकभर ह्या राष्ट्रास थोरांच्या रक्ताची सारखी आहुती द्यावी लागली. सतराव्या शतकाचे अखेरीस (१६८९) (Toleration Act) सहिष्णुतेचा कायदा पास झाला. लोकांस आपल्या मताप्रमाणे आपल्या हुकमतीने व आपल्या बळावर, पंथ, समाज व मंदिरे स्थापण्याची मोकळीक झाली. अठराव्या शतकात प्रेस्बिटेरिअन (गुरूजनसत्तात्मक), काँग्रिगेशनल (लोकसत्तात्मक) बाप्टिस्ट, वेस्लीयन इत्यादी अनेक पंथांचा प्रसार झाला. पण अद्यापि लोकांत विचारांचे स्वातंत्र्य व औदार्य आले नव्हते. चौथ्या पाचव्या शतकांत ख्रिस्ती धर्माची जी एकदा मते व सिद्धांत बनून गेले होते त्याच्या उलट ब्र काढल्यास डोके फुटण्याची अद्यापि भीती होतीच. १९ व्या शतकाच्या आरंभी ती भीती समूळ नाहीशी झाली. १८१३ साली युनिटेरिअन लोकांसही पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.

ह्याप्रमाणे १६ व्या शतकात पोपची सत्ता झुगारून दिल्यावर ह्या राष्ट्राने सतराव्या अठराव्या शतकांत, धर्मबाबतीत राजकीय सत्तेपासूनही स्वतंत्र होण्याचे प्रयत्न केले, आणि ते बहुतांशी सफळ झाले. हल्ली राष्ट्रातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या नॉनकनफार्मिस्ट म्हणजे स्वतंत्र सत्तेची आहे. बाकीची जी राष्ट्रीय संस्थेत आहे तीही केवळ आपखुषीने आहे. १९ व्या शतकात धर्मचळवळीची दिशा अगदीच बददली. आधुनिक शास्त्राचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार होऊ लागल्यापासून धर्माच्या मुळाशीच कु-हाडीचे घाव बसू लागले. ख्रिस्तीधर्मपंथांचे शास्त्रीय व ऐतिहासिक पद्धतीने संशोधन, निरनिराळ्या राष्ट्रांचे आचारविचारात दळणवळण वाढल्यामुळे निरनिराळ्या धर्माची होऊ लागलेली तुलना, विश्वविद्यालयात चाललेले सर्व धर्मांचे तुलनात्मक अध्ययन इत्यादी अनेक कारणांमुळे निरनिराळ्या पंथांतील लोकांच्या मतांत परस्पर अधिकाधिक सहानुभूती, सहिष्णुता व औदार्य वाढू लागले, इतकेच नव्हे तर युनिटेरिअन, ह्युमेनिटेरिअन, पॉझिटेव्हिस्ट इ. नवीन विचाराला अनूकूल अशा नवीन पंथांचा उदय व प्रसार होऊ लागला.

हल्ली स्थिती कशी आहे? राष्ट्रीय संस्था, तद्विरोधी निघालेले नाना स्वतंत्र पंथ, आणि ह्या सर्वांसही न जुमानता स्वतंत्रपणे व उदारपणे धर्माचरण करणारे युनिटेरिअनादी समाज ह्या सर्वांचेही कार्य सारखे जोराने चालले आहे. साप्ताहिक उपासना, रविवारच्या धर्मशिक्षणाच्या शाळा, मासिक आणि वार्षिक सभा, गरिबांकरिता स्वदेशातील मिशने आणि परकीयांकरिता चारी खंडांतील परदेशांत जगडव्याळ मिशनची योजना इ. निरनिराळी कामे सर्व पंथांतून चढाओढीने होत आहेत.

हा सर्व प्रकार पाहून परकीयांचे मन प्रथमदर्शनी गोंधळून जाते. धर्मासारख्या पवित्र बाबतीत ह्या राष्ट्राने ३-४ शतके इतकी डोईफोड व रक्तस्त्राव का केला? आताच्या ह्या शांततेच्या व समजुतीच्या काळीदेखील ह्यांच्यात इतके भिन्नभिन्न पंथ व इतक्या चुरशीची चढाओढ का आहे? नवे पंथ आणि नव्या संस्था निघाल्या आहेत त्यांत जुन्यांचा लय का होत नाही? उलट दोहोंचेही कार्य इतक्या नेटाने चालणे येथे कसे शक्य आहे? इ. प्रश्नांमुळे बिचा-या नवख्याची त्रेधा उडते आणि अखेर इंग्लंडातील प्रॉटेस्टंट धर्माचे खरे लक्षण काय, त्याची मुख्य बळकटी कशात आहे हे नीट कळेपर्यंत त्याचे समाधान होत नाही.

आजपर्यंत धर्मबाबतीत आमची दोन भिन्न प्रकारची स्थिती होत आली आहे ती अशी: जगाच्या सांसारिक उपाधीचा शीण आणि वीट येऊन आम्ही एकदम विरक्त होतो आणि जगातून उठतो. मानवी आत्म्याची अंतिम अवस्था काय होणार तिचा ठाव घेण्यात आणि अखिल विश्वाची पाळेमुळे शोधून काढण्यात आमच्या बुद्धीचा लय लागतो. ह्याप्रमाणे आमचे बंड म्हणजे सा-या विश्वाविरूद्ध, आमची स्वतंत्रता म्हणजे निस्संगता, आमचे जय म्हणजे व्यक्तीचे जय, आमचा मोक्ष आमच्यापुरताच, आमचे अनुभव, आमचे शोध व आमची भारती ही जगाच्या वाड्मयात कालवशाने अत्यंत उच्च स्थान घेतात. पण आमच्या समाजाची काय वाट! गोरगरीब, तडीतापडी ह्यांस शांतीचे व शेवटचे वाक्य कोण सांगतो? त्यांची धार्मिक भूक निवारण्याची काय योजना आहे?

उलट पक्षी, आमची भव्य व पुरातन देवस्थाने, बारा ज्योतिर्लिंगे, तीर्थे, यात्रा, पूजेचे संभार, विधीचे अवडंबर, ब्राह्मण, बडवे, पुजारी व सेवेकरी, वर्णव्यवस्था आणि मठस्थापना, शंकराचार्य आणि जगदगुरू, वेदकालापासून चालत आलेले आचार, नवीन नवीन निघणारे धार्मिक उत्सव आमि वेदोकक्तासारख्या नव्या सुधारणा इ. एक का दोन अनेक त-हेने धर्माच्या दुस-या बाजूची आमची जय्यत तयारी आहे. असे असून आमच्यात धर्म नाही असे कोण म्हणेल?

पण वर जी धर्माची दोन लक्षणे सांगितली त्यांतील एकही इंग्लंडातील धर्मास मुळीच लागू पडत नाही. येथेही नाना पंथ, नाना मते, धार्मिक कलह आमि वैमनस्य ही आहेत. केव्हा केव्हा दंगे, क्वचित खूनही होतात. पण ह्या सगळ्यांचे एक सामान्य लक्षण आहे. एक प्रकारचे राष्ट्रीय ऐक्य आहे आणि त्यातच नव्याजुन्या सा-यांची बळकटी आहे. हे लक्षण दोन शब्दांतच सांगता येते ते असे. स्वातंत्र्य आणि व्यावहारिकता. ह्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्र पोपविरूद्ध उठले. प्रजा राजाचे ऐकत नाही, फार काय, मुलगा बापाची पर्वा ठेवीत नाही! हे स्वातंत्र्य म्हणजे एक नुसते खूळ नाही. सर्व योजना व सर्व खर्च राष्ट्राकडून मिळत असता त्या सर्वांवर पाणी सोडून उलट अत्यंत कष्टमय छळ सोसूनही लोकांनी आपापले पंथ स्थापले. इतकेच नव्हे, तर सुंदर आणि टोलेजंग मंदिरे बांधली, मंडळ्या स्थापिल्या, धर्मशिक्षणाच्या शाळा व कॉलेजे उभारली आणि परदेशी प्रचंड मिशने पाठविली. हे सर्व केवळ स्वातंत्र्याचे खूळ नव्हे तर स्वत:ची हिम्मत व कळकळ. दुसरा मोठा गुण म्हणजे व्यावहारिकता. लोकशिक्षण आणि गरिबाची दाद ह्या बाबतीत ह्या पंथानी आजवर अविश्रांत परिश्रम केले आहेत व अद्यापिही करीत आहेत. लोकोपयोगी कृत्ये करण्यात नाना प्रकारच्या लालुची व करमणुकी दाखवून गरीब व उनाड लोकांस व्यसनापासून दूर ठेवण्यात ह्या निरनिराळ्या पंथांची एकमेकांवर ताण होत असते. अगदी लहान लहान कंगाल खेड्यांत जाऊन काही एक वेतन न घेता, अडाणी लोकांच्या कानांवर येथूच्या सदबोधाची चार वाक्ये ठेवण्याचे कामी गृहस्थ उपदेशकांची योजना करण्याची मेथॉडिस्ट पथाची हातोटी, लंडनसारख्या मोठ्या शहरी कुमार्गात पडून सर्वतोपरी भ्रष्ट झालेल्या तरूण बालिकांचा उद्धार करून पुन: त्यांच्याकडूनच तशा दुस-या पतितांस हातभार देण्याचे मुक्तिफौजेचे प्रयत्न, क्वेकरपंथाची सात्विकता, काँग्रिगेशनल पंथाचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन इत्यादी अनेक बाजूंनी अनेक पंथांकडून देशाचा व्यावहारिक फायदाच होत आहे. ह्या विरोधी पंथात परस्पर भिन्नता आहे तरी राष्ट्रहिताच्या कामी ह्यांचा तात्काल एक दिल होतो.

गेल्या पाचपंचवीस वर्षांत धर्माची नवी चलबिचल चालली आहे ती ही की ह्या विरोधी पंथाच्या मोठमोठ्या वार्षिक परिषदा जमू लागल्या आहेत आणि त्या सर्वांचे एक साधारण सम्मेलन स्थापन झाले आहे. ह्या जुटीमुळे ह्यांना अधिकाधिक बळ येत चालले आहे, व संख्या वाढत आहे. ह्याप्रमाणे सुमारे अर्ध्या राष्ट्राचा विरोध पडल्यामुळे धर्माची जी राष्ट्रीय संस्था तिला राजकीय मदत मिळते ती बंद करण्याची खटपट चालू आहे.

पण वरील साधारण सम्मेलनात युनिटेरिअन पंथाचा मात्र अद्यापि शिरकाव होऊ शकत नाही. कारण ह्या पंथाची मते इतकी उदार आहेत की जुन्या ख्रिस्ती लोकांच्या आग्रहास ती पटत नाहीत. म्हणून युनिटेरिअनांस अद्यापि वाळीतच रहावे लागत आहे. त्यांचीही लिव्हरपूल येथे थोड्या दिवसांपूर्वी एक मोठी त्रैवार्षिक सभा भरली होती.

इंग्लंडातील युनिटेरिअन चळवळीचे वास्तविक स्वरूप वाचकांच्या मनात नीट भरविण्याकरिता गेल्या आठवड्याच्या पत्रात इंग्लंडात हल्ली धर्माचे कार्य कसे चालले आहे, ह्याचा साधारणपणे विचार केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी लिव्हरपूल येथे युनिटेरिअन लोकांची आठवी त्रैवार्षिक परिषद भरली होती, तिजसंबंधी एक-दोन विचार ह्या पत्री कळविण्यात हेतू आहे.

युनिटेरिअन मताचा आणि समाजाचा पूर्वापार इतिहास आणि हल्ली हा समाज, धर्मात कोणती व कशी सुधारणा घडवीत आहे, ह्यासंबंधी मी मागे एका पत्रात त्रोटक माहिती दिली आहे. इंग्लंड देश सुधारणेच्या शिखरास पोहोचला आहे, विद्येची व लोकशिक्षणाचा अत्यंत प्रसार झाला आहे व अद्यापि झपाट्याने होत आहे, व्यक्तिस्वातंत्र्यास पूर्ण मुभा आहे आणि उलटपक्षी युनिटेरिअन समाजही, ऐतिहासिक ख्रिस्तीधर्मात जी शुद्ध व सार्वत्रिक तत्त्वे आहेत ती कायम राखून त्यांवर मध्ययुगात जी धूळ साचली आहे ती झाडून टाकण्याचा सावधपणे व सादरपणे प्रयत्न करीत आहे. इ. गोष्टी मनात आणता कोणाही परकीयास सहज असे वाटण्याचा संभव आहे की, इंग्लंडात सर्वत्र नाही तरी बहुसंख्या तरी ह्याच मताची असेल. पण आश्चर्याची गोष्ट ही की, प्रकार अगदी उलट आहे. इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड येथील एकंदर मिळून ३६४ च युनिटेरिअन मंदिरे आहेत. इतकेच नव्हे तर ह्याहून आश्चर्याची गोष्ट ही की, १८४० त ह्या समाजाची जी स्थिती होती त्याहून हल्ली केवळ संख्येच्या मानाने पाहता मुळीच प्रगती झालेली नाही. ह्यास पुष्कळ कारणे आहेत, ती सर्व येथे लिहिण्यास स्थळ नाही. तथापि ही परिषद कशी अस्तित्वात आली ह्याचा वरील गोष्टीशी बराच संबंध असल्यामुळे त्याचा थोडक्यात उल्लेख करणे इष्ट आहे.

सन १८१३ त युनिटेरिअन लोकांस कायद्याने पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर १८२५ त ब्रिटिश अँड फॉरेन युनिटेरिअन असोसिएशन नावाची, हल्ली मोठ्या प्रमाणावर काम करणारी मंडळी स्थापण्यात आली. ठिकठिकाणच्या गरीब समाजास मदत करणे, मंदिरे बांधून देणे, पुस्तके छापून वाटणे, बाहेर देशी मिशन पाठविणे आणि बाहेर देशी उदार धर्माची चळवळ करणा-याशी स्नेहसंबंध जोडणे इत्यादी महत्त्वाची कामे ही मंडळी आजपर्यंत करीत आली आहे. पण ही मंडळी केवळ व्यक्तिविषयक सभासदांची बनलेली आहे आणि हिची कमिटी अर्थात ह्या सभासदांकडूनच नेमण्यात येते. उलपक्षी ठिकठिकाणच्या समाजांची सर्व अंतर्बाह्य व्यवस्था लोकसत्तात्मक पायावर, तेथील सभासदांकडून होत असते. स्थानिक समाजाची सर्व व्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी त्या त्या समाजांच्या सर्व सभासद व्यक्तींवर आहे तशीच अशा सा-या समाजांची एक मध्यसंस्था स्थापून तिच्याकडून मध्यव्यवस्थेचे व प्रसाराचे काम करविण्याची जबाबादारीही ह्या ठिकठिकाणच्या समाजांच्या कमिटीवरच आहे हे उघड आहे. पण आजपर्यंत हे काम ब्रिटिश अँड फॉरेन ह्या थोड्या व्यक्तींच्या मंडळीकडूनच होत असल्यामुळे, समाजात यावा तितका जोर अद्यापि आला नाही. ही स्थिती लक्षात आणून सन १८८२ साली सर्व समाजांच्या प्रतिनिधींची ही परिषद स्थापण्यात आली. दर तीन वर्षांनी तिची एक बैठक होते. गेल्या पंधरवड्यात तिची आठवी बैठक लिव्हरपूर शहरी झाली. उपदेशकांचा पगार वाढविणे, त्यांना पेन्शन देणे, मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे आणणे, वगैरेसाठी मोठमोठे फंड जमविणे आणि इतर बरीच कामे ह्या परिषदेमुळे ह्या २१ वर्षांत झाली आहेत. ही आठवी परिषद भरण्यापूर्वी गेल्या सबंध वर्षात एका महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी वाटाघाट होत होती, ती अशी की, आजपर्यंत परिषदेने नुसते ठराव पास केले आहेत, तर ह्यापुढे तिच्या कमिटीची एक मोठी कार्यकारी संस्था बनावी, तिच्या सेक्रेटरीने नेहमी देशभर हिंडून सर्व समाजाचा प्रत्यक्ष समाचार घ्यावा व लागेल ती मदत करावी, ह्या कामास त्याने आपणास वाहून घ्यावे व त्यास भरपूर पगार द्यावा, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे युनिटेरियनांचा एक मोठा संघ (Church) स्थापावा.

ह्याप्रकारे आज वर्षभर चर्चा होऊन शेवटी परवा एकसारखे चार दिवस ह्या परिषदेचे काम लिव्हरपूल येथे झाले. ह्याची साद्यंत हकीकत इन्क्वायर पत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यातील अध्यक्षांचे भाषण व उपदेश, मुख्य कामासंबंधी रेव्ह. वुड ह्यांचा कागद, जाहीर सभेतील रेव्ह. जॅक्स व विक्सटीड ह्यांची भाषणे फार मनन करण्यासारखी आहेत. परिषद मला कशी दिसली हे थोडक्यात लिहितो.

लिव्हरपूल हे शहर अत्यंत श्रीमंत आणि सा-या इंग्लंडात पुढारलेले आहे. तेथील परिषदेच्या व्यवस्थापक मंडळीने बाहेरून आलेल्या सुमारे ६०० प्रतिनिधींची उत्तम व्यवस्था सर्व आपल्या खर्चाने केली होती. टाऊन हॉलातील सुंदर आणि भव्य गायनशाळेत चार दिवस सकाळी १० पासून तो रात्री १० पर्यंत सभेचे काम चालत असे. नेहमी सुमारे १००० चा श्रोतृवृंद शांतपणे बसून ऐकत असे. मध्यंतरी एका जवळच्या मोठ्या हॉटेलात सर्व प्रतिनिधींचा व पाहुण्यांचा एकाच स्थळी मोठ्या समारंभाने भोजनविधी होत असे. तिस-या प्रहरी चहासाठी एकदा बैठक उठे तेव्हाही निरनिराळ्या भागांतून आलेल्या बंधुभगिनींची परस्पर ओळख होऊन अगत्याची संभाषणे होत. ह्या समाजात स्त्रीपुरूषांची संख्या बहुतेक समसमानच होती. मुख्य दिवसाचे काम बरेच महत्त्वाचे आणि वादग्रस्त असूनही वादविवाद अगदी सुरळीतपणे झाला. पहिले दिवशी परिषदेच्या उपासनेच्या वेळी फिलार्मोनिक हॉल नावाच्या अत्यंत भव्य सार्वजनिक मंदिरात सुमारे १३०० स्त्री-पुरूषांची गर्दी जमली होती. प्रार्थनेच्या आरंभी (Awake our souls! Away our fears!) ह्या पद्याचा टाहो एकदम जेव्हा १३०० कंठांतून फुटून बाहेर आला, तेव्हा इमारतीच्या दगडांनाही जणू हुरूप येऊन ते प्रतिध्वनीच्या मिषाने आम्हांस हाक देऊ लागले. जाहीरसभेत श्रोतृवृंद १६०० वर हजर होता. मी मागे एकदा युनिटेरिअन समाज म्हणजे सुधारलेल्या जगाचे प्रबुद्ध अंतर्याम असे म्हटले होते. त्याची मला येथे चांगली प्रचीती आली. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ह्या सर्व बाजूंनी जरी जहाल सुधारकी भाषणे झाली, तरी चहूंकडून टाळ्यांचा गजरच झाला. जणू वॉकर्स आर्ट ग्यालरी नावाच्या एका अफाट चित्रसंग्रहालयात परिषदेचा सामाजिक मेळा (Conversazione) जमला, त्यावेळी इकडील रिवाजाप्रमाणे सायंकाळचा प्रेक्षणीय पेहराव करून येथील कुलीन व प्रमुख कुटुंबातील सुमारे दोन हजार स्त्री-पुरूषे जमली होती. अखेरीस शहरच्या कंगाल वस्तीत गरीबांसाठी स्थापलेल्या एका मिशन-मंदिरात मद्यपान निषेधाची एक टोलेजंग सभा होऊन परिषदेचे काम आटपले. मुख्य काम जे मध्यसंघ स्थापण्याविषयीचे त्याविषयी सर्व समाजांच्या मतानुरूप सविस्तर विचार करून अखेर निकाल लावण्याचा अधिकार परिषदेच्या कमिटीस देण्यात आला.

असो. वाचकहो, आणि विशेषत: ब्राह्मबंधूंनो, ह्या सातासमुद्रांपलीकडच्या सात हजार मैलांवरच्या परदेशी गप्पा तुम्हांला सांगण्यात काय तात्पर्य बरे! आज आम्ही ब्राह्मबंधू युनिटेरिअनांप्रमाणे सारख्याच नावेत बसून संगतीने एकाच तीराकडे निघालो आहो. त्यांच्यासारख्याच पण शतपट अधिक आम्हांपुढे अडचणी आहेत. त्यांच्यासारखीच पण सहस्त्रपट अधिक आमच्यावर जबाबदारी आहे. पण ते करीत आहेत त्या खटपटी, नजरेने पाहून त्यांच्या अंशमात्रही खटपट करण्यास आम्ही कचरतो, ह्याला काय म्हणावे! इंग्लिश लोकांचे युनिटेरिअन चळवळीवाचून विशेषसे अडतेच असे नाही. येथे कोणी नव्या पंथाचा असो की जुन्या पंथाचा असो, मानवी प्रगतीच्या प्रत्येक बाबतीत हरत-हेने तो आपले पाऊल पुढेच टाकीत असतो. आमचे तसे आहे काय? नवीन घोडे जुंपलेल्या गाडीप्रमाणे आमच्या राष्ट्राची ओढाताण होत आहे. आम्ही एकीकडे ओढावे तर ब्राह्मसमाजाबाहेरचे आमचे बंधू अगदी उलट दिशेने ओढ घेतात. फार काय तर समाजातीलच आमचे बंधू वेळेला अंग चोरतात! सपशेल जूं टाकून मोकळे होतातही केव्हा केव्हा! प्रत्येकाने आपली शिकस्त केली तरी आमच्या अवजड राष्ट्राची गाडी हालेल की नाही ह्याची भीती असूनही आम्ही धरसोड चालविली आहे! आमचे समाज थोडे, आमचे सभासद कमी, ह्याबद्दल वाईट वाटावयाला नको. आहेत. त्याच समाजांचा परस्पर संबंध समाधानकारक नाही, आहेत त्याच सभासदांच्या कर्तव्याची वाटणी न्यायाची नाही, ह्याबद्दल मात्र अवश्य वाईट वाटले पाहिजे, वाटत नसेल तर मग सभासदांची संख्या कशी वाढेल? आणि वाढून तरी काय फळ! आमच्या युनिटेरिअन मित्रांना मध्यसंघाची आवश्यकता वाटून तिच्या तयारीला ते लागलेदेखील. पुढील त्रैवार्षिक परिषदेच्या आधीच ते काम उरकून जाईल. पण आमची वाट काय? आम्ही आमचा प्रसार का होत नसावा ह्याबद्दल नुसते आश्चर्य मानीतच बसणार काय?

आवड आणि प्रीती

गोड तुझे नाम द्याळा आवडते मज||

आवड आणि प्रीती हे दोन शब्द व्यवहारात बहुधा आपण समानार्थीच योजीत असतो पण ह्यांचे अर्थ व संकेत परस्परांशी ताडून पाहून त्यांची किंचित परीक्षा केली तर लवकरच कळून चुकेल की ते परस्परांहून भिन्न आहेत, इतकेच नव्हे तर अगदी उलट आहेत. आपण म्हणतो की आपल्याला एकादी वस्तू आवडते, जशी एकादे दिवशी रूचकर झालेली ताटातली चटणी, अंगावरचा अलंकार किंवा पहाडातला अगर समुद्रकाठचा देखावा, अथवा कालिदासासारख्याच्या काव्यातील एकादा उतारा. दुस-या पक्षी आम्ही म्हणतो की एकाद्या प्राण्यावर प्रेम आहे, जसे आपले लाडके कुत्रे अथवा सलगीचा मित्र किंवा एकुलता एक पुत्र ह्यावर आम्ही करतो ते. ताटातल्या चटणीपासून तो कविराजाच्या काव्यापर्यंत परंपरेने उंच उंच होत जाणारे हे सर्व पदार्थ एक पक्षी आपल्या आवडीचे विषय होतात तर दुस-या पक्षी कुत्र्यापासून तो पोटच्या गोळ्यापर्यंत प्राणी आपल्या प्रीतीचे विषय होतात. आता व्यवहारात यद्यपि प्रीती आणि आवड ह्या शब्दांची योजना करिताना आपण अगदी सहज गोंधळ करून टाकतो, तरी वरील उदाहरणावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे की आवडीचे सारे विषय आमच्या केवळ थोड्याबहुत उपभोगास कारण होतात, तर प्रीतीचे विषय मात्र आम्हांस कमी अधिक मानाने स्वार्थत्याग करावयास लावतात म्हणजे आवडीचे लक्षण उपभोग आणि प्रीतीचे लक्षण ह्याच्या उलट स्वार्थत्याग हे होय. आवडीचा विषय कोणताही अचेतन पदार्थ असू शकतो, पण प्रीतीचा विषय होण्याला चैतन्याचीच जरूरी असते, मग ते चैतन्य कुत्र्यामांजरातल्याप्रमाणे झाकलेले बद्ध चैतन्य असो किंवा साधुसंतातल्याप्रमाणे प्रकाशणारे मुक्त चैतन्य असो. एका पक्षी आमच्या आवडीच्या विषयाला आम्ही आपल्या सुखासाठी त्याचा अंत होईपर्यतही झिजविण्यास किंवा एकदम गट्ट करण्यासही तयार असतो, तर दुस-या आमच्या प्रतीच्या विषयासाठी आम्ही स्वत:चा अगदी अंत होईतोपर्यंत तनमन झिजून जातो. आता असेही काही विक्षिप्तराव आढळतात की जे आपल्या फाटक्या जोड्यासाठीही प्राण धोक्यात घालतील. ह्या उत्पटांग भावनेला आवडही म्हणता येत नाही व प्रीतीही म्हणता येत नाही. ती केवळ कृपणत; व तिचा विचारही येथे करावयास नको. पण वरील उदाहरणावरून आवड व प्रीती हे केवळ पर्यायवाचक शब्द नाहीत हे सिद्ध झाले. आणि म्हणून जरी आम्ही दिवाणखान्यतल्या आपल्या एका आवडीच्या सुबक आरामखुर्चीवर आपली प्रीती आहे असे केव्हा केव्हा व्यवहारात सहज म्हणून जातो तरी खरे पाहता हा अगदी चुकीचा व्यवहार आहे हे उघड आहे.

पण प्रस्तुत समयी मला केवळ भाषेची मीमांसा किंवा दुरूस्ती करावयाची नाही. आवड आणि प्रीती ह्यांचे खरे अर्थ ह्या प्रसंगी स्पष्ट करण्याचा उद्देश निराळाच आहे. आवड आणि प्रीती ह्यांची, भोग आणि त्याग अशी परस्पर विरूद्ध लक्षणे आहेत असे सांगितले. असे असूनही संसारात निरनिराळ्या माणसांशी आमचे जे स्नेहाचे संबंध जडतात त्यांना सरसकट प्रीती हेच नाव देण्यात येते.

पण वस्तुत: बहुतेक प्रकार केवळ आवडीचेच असतात. एका मित्राने मला स्पष्ट सांगितले की, त्यांना लहान मुलांवर प्रीती करावीशी वाटते पण ती मुले मात्र सुंदर असली पाहिजेत. रस्त्यात जर एकादे गोजिरवाणे मूल पाहिले तर ते कोणाचेही असो उचलून त्याचे चुंबन घ्यावेसे त्यांना वाटते. स्पष्ट सांगितल्याबद्दल मित्राची मी तारीफ केली. पण ज्या गोड बालकाविषयी ह्या मित्राची अशी स्थिती होते त्याच्या आईची त्या बालकासंबंधी भावना व ह्या मित्राची भावना किती जमीनअस्मानाचा भेद. परवा एका वर्तमानपत्रात वाचले की दार्जिलिंगकडे एक आगगाडी धावत चालली असता एकाएकी गाडीबाहेर एक मूल पडले, त्यासरशी त्याच्या आईने खाली उडी टाकली. तिचा परिणाम असा झाला की गार्डाने गाडी थांबविली व दोघांचेही प्राण वाचले. कुठे कौतुकाचे नुसते चुंबन आणि कुठे हा कडेलोट. संसारात आम्ही परस्परांवर स्नेह करितो (ह्या मासिक कौटुंबिक उपासनांचा उद्देशही परस्पर स्नेह वाढविण्याचाच आहे.) तेव्हा आम्ही आपापल्या स्नेहाची आपल्याशीच पारख करावयाला पाहिजे आणि त्यात आवडीचा भोग किती आहे व प्रीतीचा त्याग किती आहे हे वेळोवेळी ठरविले पाहिजे. नाहीतर ही एक नित्यनैमित्तिक फसवणूक चालली आहे ती तशीच कायम राहील.

ह्यावरून कोणी कोणाच्या गुणावर लुब्ध होऊन त्याचे कौतुक करू नये असे म्हणणे नाही. उलट एकाची दुस-यावर आवड बसमे हा उदात्त आत्मिक व्यापार आहे हे खरे. तथापि ह्या व्यापाराचा प्रीतिरूपी याहून अत्यंत उदात्त आत्मिक व्यापाराशी विपर्यास होऊ न देण्याची खबरदारी घेतली पाहिजे हेच सांगण्याचा हेतू आहे.

आता आवड आणि प्रीती ह्या आमच्या भिन्न भावना ईश्वराचे ठायी कशा असतात ह्याचा विचार करू. आणि आजच्या विषयाचा हाच मुख्य उद्देश आहे. कोणताही अचेतन पदार्थ आमच्या आवडीचा विषय होऊ शकतो. पण प्रीतीचा होत नाही, म्हणजे तो पदार्थ कितीही आवडता असला तरी आम्ही त्याच्यासाठी कधी काही स्वार्थत्याग करीत नाही. मनुष्यप्राणी म्हणजे एक जड आणि चैतन्याचे मिश्रण आहे. तो केव्हा आवडीचा, केव्हा प्रतीचा, केव्हा दोन्हींचाही विषय होत असतो. एकाद्या आपल्या जिवलग मित्रावर आपले पुष्कळ प्रेम व आदर असतो पण काही मतभेदामुळे अगर रूचिवैचित्र्यामुळे अथवा दुस-या असल्या क्षुल्लक उपाधीमुळे त्याच्यावर आपली तितकी आवड नसते. तसेच एकाद्या खुशमस्क-या सोबत्याचा आपल्याला मोठा शोक लागून जातो तथापि त्याच्यावर तितकी प्रीती नसते, तसे आम्हा अपूर्ण मानवांचे संबंध असतात. पण शुद्धचैतन्य परिपूर्ण परमात्मा ह्याच्याशीदेखील आवड असल्यास प्रीती नाही, किंवा प्रीती असून आवड नाही, अशी अर्धवट धरसोडीची भावना असू शकेल काय?

अगोदर ईश्वरावर आमची नुसती आवडही जडणे दुर्मिळ. वेळोवेळी विषयाकडेच ओढ घेणारे आमचे मन त्याने विषयातील निराकार ज्योतीकडे धाव घेणे म्हणजे अपवादच. तथापि असे अपवादक पुरूष बरेच आढळतात. किंबहुना आमच्या सा-यांची ही अशी अपवादक स्थिती थोडीबहुत केव्हाना केव्हा तरी होत असते. विशेषत: एकांतात भजन, प्रार्थना, चिंतन हे करू लागलो असताना, आत्मपरीक्षण जोराने चालले असता, पश्चात्तापशुद्धीचा अनुभव घेत असता, भूत, भविष्य, वर्तमान विशाल विश्वातील सर्व चांगल्या आणि सामर्थ्यवान वस्तू एकवटून जणू आकारालाच येते आणि भक्तीच्या योगे मृदू झालेले आमचे मन त्या आकाराला साक्षी होते. अशा स्थितीत ईश्वर आपल्याला आवडू लागतो. ही वेळ अमोल सुखाची आणि उदात्त अनुभवाची हे सर्व खरे, पण अशा वेळी ईश्वरावर आम्ही प्रीती करतो किंवा त्याच्या अपार मंगल गुणांचे केवळ कौतुक करितो बरे? अशा वेळी सुख होत असते पण काही त्याची सेवा घडत असते काय? आध्यात्मिक सुख पुष्कळसे अनुभवून सेवेची पाळी आल्याबरोबर आम्ही चुकवाचुकवी करीत नाही काय? जसे आपल्या अडचणीत पडलेल्या मित्रासाठी किंवा मरणोन्मुख झालेल्या बालकासाठी अथवा आपल्या प्रिय मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक दु:खे सोसतो, तसे ईश्वराच्या इच्छेसाठी काही झीज सोसतो काय? असे जर होत नसेल तर ईश्वरावर आपली प्रीती नसून केवळ केव्हा तरी आवड मात्र बसते असे होते. पण किंचित सूक्ष्म विचार केला तर कळून चुकेल की ईश्वराची आवड लागणे आणि त्याजवर प्रीती न करणे, किंवा त्याजवर प्रीती करणे पण त्याची आवड न लागणे, ह्या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. ह्या धरसोडीचे प्रकार आम्हा मनुष्यांच्या परस्पर संबंधात असणे शक्य आहे. पण शुद्ध चैतन्याशी असा अर्धवट संबंध जडणे मुळीच अशक्य आहे. तसा अर्धवट अनुभव येत असल्यास आपण आपली फसवणूक करून घेत आहो असे खास समजावे.

गोड तुझे नाम दयाळ आवडते मज||
असे वाटल्याबरोबर
काया वाचा मन हे चरणी डुल्लले गहाण |
कृपा ऋण नचि फिटे अर्पिताही प्राण||
असाही अनुभव, नुसता आपल्यालाच नव्हे तर दुस-यालाही आला पाहिजे, नाही तर दोन्ही अनुभव खोटे आणि पोकळ समजावे.

आपुले स्वहित करावे पै आधी

मंगळवार तारीख १४ जून रोजी कै. वासुदेवराव नवरंगे ह्यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमित्त रात्रौ रा. रा. सत्यवंत वासुदेव नवरंगे ह्यांचे घरी रा. रा. शिंदे ह्यांनी कीर्तन केले.

आपुले स्वहित करावे पै आधी| विचारूनी बुद्धी समाधान||
नये मागे पाहो वाट फिरोनिया| दुसरा संगिया साहकारी||
आपुलीया बळे घालावी हे कास| न येणेची आस आणिकांची||
तुका म्हणे ब्रह्मरसी दयावी बुडी| वासना हे कुडी सांडुनिया||

या अभंगाच्या द्वारे विषयोपक्रम करताना सुधारकाने अर्थात आदेशाच्या पाठीमागे लागलेल्या मनुष्याने कसे एकाकीच एकसारखे पुढे पाऊल टाकीत गेले पाहिजे ह्याचे निर्भीड पण मनोरंजक रीतीने प्रतिपादन केले. ते मुख्यत: म्हणाले की, आपण जर आपल्या स्वहिताकडे लक्ष देऊन ते केले नाही, काहीतरी जीवनादर्श सतत डोळ्यापुढे ठेवून त्या बाजूने एकेक पाऊल पुढे घेत गेलो नाही तर इतर आपल्या व्यवहराचे स्वरूप कसे आहे हे दार कबीर ह्यांनी ‘चामडेकी पुतली तू’ ह्या पद्यात स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणतात की चामड्याची गाय, तिचे दूध दही हेही चामड्याचेच, ते खाणारे मूलही चामड्याचेच, हत्ती चामड्याचा, घोडा उंट चामड्यांचे, बाजा वाजचो तोही चामड्याचा, फार काय बादशाह चामड्याचा, वजीर चामड्याचा, सारी दुनिया चामड्याची आहे. म्हणजे सर्व जगभर एक मोठा थोरला चामड्याचा कारखाना चालू आहे. म्हणून उद्धार होण्याचा मार्ग ते उपदेशितात की, हे चामड्याचे पुतळी, तू ईश्वराचे भजन साधून घे. नंतर त्यांनी महाभारताच्या अनुभासन पर्वातील वृद्ध ब्राह्मणीचा मुलगा सर्पदंशाने मेला ती गोष्ट सांगून ते म्हणाले की, सध्या जे तत्वज्ञान प्रचलित होत आहे, तेही आपणास असेच सांगत आहे की, ज्याचे त्याचे कर्माचा परिणाम त्यास भोगावा लागतो. म्हणून आदर्शमय कर्माकडे नेहमी आपला रोख असावा. या संबंधात तुकोबांचा ‘धाई अंतरीच्या सुखे’ हा अभंग ध्यानात वागवावा. नाही तर आपले समाधान असते एकीकडे, स्वहित एकीकडे व कर्तव्य एकीकडे असे चाललेले असते. ह्यासाठी इतर कोणी साह्यकारी आहेत की नाहीत याची वाट न पहाता, सर्वाचे एकमत झाले आहे की नाही ते न पाहता, इतकेच नव्हे तर बहुमत निदान आपल्या कुटुंबातील माणसांचे तरी मत अनुकूल आहे की नाही ह्याचाही विचार करण्यास न थांबता स्वबुद्धिनुसार वागेल पाहिजे. असे न केल्यास आपण वेडे, बिचारे वेडे सुखी तरी असतात, आपण दु:खी ठरू. स्वमतानुरूप आचरण न केले तर कसे मूर्खपणाचे होईल पहा, चंदनाचे लाकूड जाळून रत्नखचित उंची भाड्यांत तिळाची पेंढ जाळणा-या किंवा सोन्याच्या नांगराने काय म्हणे तर रूईच्या मुळीसाठी जमीन उकरणा-या वा काद्रवाला कापराच्या तुकड्यांनी आळे घालणा-या मंदभाग्याप्रमाणे आपण हतभागी ठरू म्हणून वेळेचा, संधीचा दुरूपयोग करून नये. तर काय करावे? कबीरांनी उपदेशिल्याप्रमाणे ‘चामडेकी पुतली तू करले भजन’ हेच एक उत्तर.

भजन म्हणजे काय? भजन म्हणजे आदर्शाच्या पाठीमागे लागणे. पण आदर्शासंबंधाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आपला आदर्श आपणास दिसला, उद्दिष्ट कळले तरी सुद्धा श्रीगुरूदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘आवडतो प्रिय परि गवसेना’ आपणास स्वजनाहूनही प्रिय असा जो आपला देह तोही विटेल, कंटाळेल पण आदर्श काही विटत नाही. संपत नाही.

ईश्वर हा नेहमी अदृश्य आदर्श, स्वहित ईश्वर हा नुसता नामभेद आहे. कोणी कशाही दृष्टीने विचार करावा, वस्तु एकच. धार्मिकाच्या दृष्टीने जे ईश्वरभजन तेच काहीच्या भाषेने आदर्शाच्या पाठी लागणे किंवा स्वहित साधणे होय. ही वस्तु एका अर्थी प्राप्त होत नाही. प्राप्त होण्याचीच असते. आणखी एका अर्थी ही वस्तु म्हणजे आदर्श किंवा ईश्वर स्वहित ह्यांच्या संबंधीची कल्पना सफल झाली असे म्हणावयाचे केव्हा? तर त्या कल्पनेच्या पलिकडे आणखी उच्च कल्पना दिसू लागली असेल तेव्हा.

दार्जिलिंगच्या बाजूने हिमालयाकडे जावे तेव्हा वाटते की, आपण हिमालयावर आलो पण धवलगिरी नामक शिखर तेथे दिसावयास लागून हिमालय अद्यापि चढावयाचा आहे हे दर्शविते. ते चढून जावे व आता वरील हिमालयावर आलो असे वाटू लागते, इतक्यात पलिकडे मौंट एव्हरेस्ट किंवा कैलास पर्वत दिसू लागतो. सारांश हिमालयाच्या शिखराप्रमाणे एक आदर्श सिद्ध झाला किंवा होतासा वाटला तोच त्यातून दुसरा उच्चतर आदर्श उदित होतो. अशी आदर्शाची परंपरा लागलेली असते. म्हणून आपली आशा सदैव जागृत ठेवली पाहिजे असे कवीने म्हटले आहे.

“श्री. गुरूदास अनन्य घडे जरी| अनुभव तंतू कधीही तुटेना||

पण आपणापैकी बहुतेकांना हा अनुभव तंतू, ही आदर्श परंपरा तुटण्याची भीतीच वाटायला नको| असा हा अनुभव एका आदर्शासंबंधाने जरी घडून येईल तर मग पुढे तो असाच येत राहील काय अशी चिंता मनाला वाटणार.

एक आदर्श तरी कोणी नीट सांभाळून अनुसरला आहे? आपण तितके अनन्य असतो कोठे? अन्य गतीप्रत जायला प्रेम किती जिवंत, जाज्वल्य किती रसरसीत पाहिजे त्या संबंधाने अशी कविता आहे.
प्रेम पियाला जो पिये, सीस दक्षिणा देय|
लोभी सीस न दे सके, नाम प्रेमका लेय|
जा घट प्रेम संचरे, सो धर जान मसान|
जसे खाल लुहारकी, स्वास लेत बिन प्राण||
आणखी उद्दिष्टासाठी ज्याने सर्व त्याग केला तो खरोखरी फकीर. केशव. स्वामी म्हणतात:

“ऐसी फकीर नही रे भाई| येतो सालिम वे शरमाई ||धृ.||
चेलेके धर हात पसारे| दुनियादारकू मानत प्यारे ||१||
मै घर लडके मनमे घरना| बाहेर निमाज रोज करना||२||
कान खोलकर केशव बोले | गाफील अलबत खावे झाली||३||

तात्पर्य दुनियादारी ज्यांना करावयाची असेल त्यांनी तीत पडावे. त्यांनी वृथा फकिरीचा आव आणू नये आणि ज्यांना आपले स्वहित संपादन करावयाचे आहे, आदर्शाप्रमाणे वागावयाचे आहे, उद्दिष्टास एकसारखे अट्टाहासाने अनुसरावयाचे आहे अर्थात चामड्याच्या पुतळीच्या जन्मात ईश्वरभजन साधावयाचे आहे, त्यांनी स्वत:च्या सोज्वळ बुद्धीप्रमाणे वागून आत्मसमाधानात सर्व काही तुटी समजून घेतली पाहिजे. ह्या कामी इतर कोणी आपल्याबरोबर येतील अशी इतरांची वाट पहात बसणे, ही कोती बुद्धी होय. हिला त्यागून आपल्या एकट्याच्याच बळाने ब्रह्मरसी बुडी घालावयास पाहिजे असा तुकोबांचा तसाच इतर साधू संतांचा आशय आहे.

  1. आपुलिया बळे घालावी हे कास
  2. आपला व खालील प्राण्यांचा संबंध
  3. आनंदवाद
  4. आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
  • 33
  • 34
  • 35
Page 31 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी