1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

आपुलिया बळे घालावी हे कास

विषयोपक्रम :- ह्या मानवी संसारामध्ये मनुष्याची बुद्धी उत्तरोत्तर जसजशी जास्त विकसित होत जाते, तसतसा त्याच्या कर्तव्याचा प्रदेश विस्तृत होऊन त्याची बुद्धी संकीर्ण होते व अशा वेळेस काय करावे असा त्याला भ्रम होत असतो. त्याची चित्तशुद्धी आणि समाजहित ह्या दोन कर्तव्यांचा कलह लागून बुद्धी व्यामिश्रित होते. प्राचीन काळी वेदांतात समष्टी, व्यष्टी ह्या दोन भावना जरी अवगत होत्या तरी अर्वाचीन काळाप्रमाणे तेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. आता प्रत्येकाची जात, समाज, राष्ट्र, जग अशा उत्तरोत्तर समष्टी सुधारणेकडे ध्यास लागतो आणि अंतःकरणशुद्धी ह्या व्यष्टी सुधारणेची हयगय होते आणि त्यामुळे समष्टी सुधारणेलाही बाध येतो. तुकाराम म्हणतात, अशा वेळेस एक गोष्ट करा ती ही की –

आपुले स्वहित करावे पै आधी । विचारुनी बुद्धी समाधान ।।
नये मागे पाहो वाट फिरोनिया । दुसरा संगिया साहाकारी ।।
आपुलिया बळे घालावी हे कास । न घेणेचि आस आणिकाची ।।
तुका म्हणे ब्रह्मरसी द्यावी बुडी । वासना हे कुडी सांडुनिया ।।

आपल्या स्वतःच्या बद्धीला ज्यायोगे समाधान वाटेल अशी गोष्ट करा. स्वतःच्या बुद्धीला सोडून दुस-याच्या बुद्धीचे समाधान पाहू नका. जितकी त्वरा करवेल तितकी करून आपले हित साधून घ्या. कारण –
जरा टुक सोच ये गाफील, । के दमका क्या ठिकाना है ।
निकल जब ये गया तनसे । तो सब आपना बेगाना है ।।१।।
मुशाफिर तूं है, यह दुनिया । सराहे भूल मत गाफील ।
सफर परलोकका आखिर । तुझे दरवेश आना है ।।२।।
(फुट नोट – ता. १४-६-१९१० रोजी रा.रा. सत्यवंत वासुदेव नवरंगे ह्यांच्या घरी त्यांचे वडील प. वा. वासुदेव बाबाजी नवरंगे ह्यांच्या तिस-या पुण्यतिथिनिमित्त केलेल्या हरिकीर्तनाचा सारांश.)

तुमचे जीवित फार थोडे आहे, त्याचा प्रदेश फार आकुंचित आहे, तुमचे ठिकाण कोठे आहे ? पर्यवसान कशात आहे ह्याचा विचार करा. ह्या तनूतून दम निघून गेला म्हणजे जे आपले म्हणून समजतो ते परकीय बनेल. आपण ह्या जगामध्ये मुशाफर असून आपली वसती तात्पुरती आहे. ही सराई-धर्मशाळा आहे, कायमची वसती नाही. सध्या आपण ज्या पायरीवर आहो त्याच्या वरच्या पायरीवर जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बुद्धीचे बदलत जाणारे आपले कर्तव्य करीत असता, आपल्या बुद्धीचे समाधान केले पाहिजे, कारण –
न जाने कौनसी बीरया । बजेगा कूच नक्कारा ।।
विषयसुख देख मत भूलो । वृथा जंजालमें फूलो ।।
जगत है रैनका सुपना । समज मन कोई नही अपना ।।
तजो मन लोभ चतुराई । भजो हरिचरण सुखदाई ।।

कोणत्या वेळेस ह्या पाय-या आपटतील ह्याचा नियम नाही, ह्या प्रवासाचा आदी व अंत अनिश्चित आहे, हे सर्व जगत् क्षणभंगुर आहे व नेहमी बदलत जाणारे असून रात्रीच्या वेळी पडलेल्या स्वप्नाप्रमाणे आहे. आपले मत स्थापित करण्याकरिता प्रयत्नाने बहुमत आपणाकडे मिळविण्याची चतुराई आपण करू नये. त्यायोगे आपणाला खरे सुख प्राप्त होणार नाही. ते मिळविण्यास हरीचे चरण घट्ट धरले पाहिजेत. नाही तर-
चामडेकी पूतली तूं करले भजन ।।धृ।।
चामडेकी पूतली चांवलेवे पान ।
आछे आछे कपडे पहिरे करत गुमान ।।
चामडेका बछा चामडेकी गाय ।
चामडेका दूध दही चामडेमें जाय ।।
चामडेका हाथीघोडा चामडेका उंठ ।
चामडेका बाजा बाजे बाजे चारो खूंट ।।
चामडेका बादशहा चामडेका वजीर ।
चामडेकी सारी दुनिया बोले दास कबीर ।।

मनुष्ये कातड्याच्या बाहुल्या आहेत, त्या बाहुल्या तरी सुंदर असाव्या तशा नसून बहुतेक कुरूप आहेत. शंभरामध्ये एकादी दुसरी सुंदर असते. अशी स्थिती असूनही मनुष्य कितीतरी गर्व वहातो ! पानसुपारी खाऊन कृत्रिम सौंदर्याने कुरुपतेचे तो प्रदर्शन करीत असतो. एका राष्ट्राचे सौंदर्य दुस-या राष्ट्रास हसावयास लावते, एकाद्याची टोपी, जोडा किंवा अंगरखा दुस-यास हास्यास्पद वाटतो. दुस-याला बरे वाटावे म्हणून आपण चांगला पेहराव करतो. ह्याप्रमाणे आपण ह्या कातड्याच्या देहाचा विनाकारण गर्व वाहतो. जिचे आपण दहीदूध खातो ती गाय चामड्याचीच आहे, तिचे वासरू, दही, दूध देखील कातड्याचेच आहे, आणि ते दूधही कातड्याच्याच पोटात जाते. हत्ती, घोडे, उंट, वजीर व बादशहादेखील कातड्याचाच आहे. अशी ही सर्व दुनियाच कातड्याची बनलेली आहे. तथापि आपल्या आदर्शाच्या मागे लागून आपण जर उच्चपद संपादन करून आपले हित साधून घेतले तर ह्या चामड्याच्या देहाचे सार्थक होते. जेथे जेथे भजन होत असते तेथे तेथे आत्माराम येत असतो, नाही तर निसते चामडे रहाते. आपण जर स्वहित लवकर साधून घेतले नाही तर आपण काळाच्या जबड्यात जाऊ. काळ कसा आहे तर-
पुरंदरसहस्त्राणि चक्रवर्तिशतानि च ।
निर्वापितानी कालेन प्रदीपा इव वायुना ।।
अद्यैव हसितं गीतं पठित यैः शरीरिभिः ।
अद्यैव ते न दृश्यन्ते कष्ट कालस्य चेष्टितम ।।
म्रियमाणं मृतं बंधुं शोचन्ते परिदेविनः ।
आत्मानं नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम ।।

मोठमोठी शहरे काबीज करणारा सोनापती, एवढेच नव्हे तर सार्वभौम राजासुद्धा काळाच्या एका फुंकाराने नाहीसा होतो. थोड्या वेळेपूर्वी वाचीत असलेला किंवा सुस्वर गायन गात असलेला मनुष्य एकदम काळाच्या तावडीत सापडतो. ह्या काळाने सर्वांना आपल्या मुठीत धरलेले आहे. परंतु हा कालवादसुद्धा खरा नाही. कर्म हेच सर्वांपेक्षा बलवत्तर आहे. महाभारतातील अनुशासनपर्वामध्ये अशी गोष्ट आहे की, गौतमी नावाच्या एका वृद्ध बाईचा एकुलता एक मुलगा साप चावून मेला, तेव्हा अर्जुनका नावाच्या व्याधाने त्या सापास जिवंत धरून आणून, ह्यास कोणती शिक्षा करू म्हणून गौतमीस विचारले. त्यावर तिने सापासच ती गोष्ट विचारण्यास सांगितले. सापास विच्यारल्यावरून त्याने उत्तर दिले की, ह्यात माझा काही एक अपराध नाही, मी मरणाचा दास आहे, मरणाने सांगितलेले काम मी बजावतो एवढेच. त्यावरून व्याध्याने मरणास जिवंत पकडून आणून हे दुष्कृत्य तू का केलेस म्हणून त्याला विचारले. मरणाने उत्तर दिले, “बाबा, मी सापासारखाच काळाचा नोकर आहे. त्याच्याच आज्ञेवरून मी पडशाकडे, खोकल्याकडे, तापाकडे वगैरे अनेक रोगांकडे जाऊन मनुष्यांना घेऊन येतो.” पुढे व्याधाने त्या काळासही पकडून आणिले, तेव्हा काळाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले –
कर्मदायादवौल्लोकः कर्मसंबंधलक्षणः ।
कर्माणि चोदयन्तीह यथान्योन्यं तथा वयम् ।।
यथा मृ त्पिंडतः कर्ता कुरुते यद्यदिच्छति ।
एवमात्मकृतं कर्म मानवः प्रतिपद्यते ।।
यथाच्छायातपौ नित्यं सुसंबंद्धौ निरंतरम् ।
तथा कर्मच कर्ता च संबंद्धावात्मकर्मभिः ।।
एवं नाहं नवैर्मृत्युर्नसर्पो न यथा भवान् ।
न चेयं ब्राह्मणी वृद्धा शिशुरेवात्र कारणम् ।।

मी काही एक करीत नसतो. जे काही घडते ते ज्याच्या त्याच्या कर्मामुळे घडत असते. कर्मसंबंधहीन अशी कोणतीच वस्तू नाही. सर्व भाव मात्र कर्मसंबंधलक्षण आहे. एका कर्मामुळे दुसरे कर्म उद्भवते. अशी ही मालिका सारखी चालू आहे. आम्ही सर्वजण छकड्याला जुंपलेले बैल आहो. कर्म वा कर्ता ह्यांचा अन्योन्य संबंध आहे. आज असे कर्म नाही की जे स्वयंभू आहे. कर्ता अगोदर की कर्म अगोदर हे एक मोठे कोडे आहे. बीजांकुरन्यायाप्रमाणे कर्ता, कर्माचा बाप, किंवा कर्म कर्त्याचा बाप हे काही सांगता येत नाही. कर्त्याच्या इच्छेच्या बीजाभोवती कर्माची जमीन, कर्माचे खत, कर्माचे पाणी व कर्माची हवा असते. त्यांतून जो अंकुर येतो त्याचा भाग कर्माकडे किती व कर्त्याकडे किती हे कोणी सांगावे ? कुंभार ज्याप्रमाणे आपल्या इच्छेनुरूप मडके बनवितो, त्याप्रमाणे मनुष्य स्वेच्छेने कर्म करीत असतो व कर्मही मनुष्येच्छेला आपल्यापरी वळवीत असते. ज्याप्रमाणे ऊन व सावली एकमेकांवर अवलंबून असतात त्याप्रमाणे कर्म व कर्ता एकमेकांवर अवलंबून असतात. परस्परांची परस्परांवर सूक्ष्म क्रिया, प्रतिक्रिया (Interaction) होत असते. व्याध, साप, मरण, काळ, किंवा गौतमी ह्यांपैकी कोणीही जबाबदार नाही तर त्या मुलाचेच जे कर्म त्याने त्यास नेले आहे. कर्मच सर्वांत श्रेष्ठ आहे. असे आदर्शमय कर्म आपल्या बुद्धीचे समाधान साधून आपण करावे, व आपली बुद्धी स्थिर करावी. भलताच वाद माजवू नये, नाही तर तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘वादे ब्रह्मवृंदे गेली वायां’ असे होईल. आपल्या जीवनपथापासून आपण एक अंगुलीभरही दूर जाऊ नये. नानाप्रकारच्या मतांचा व जीवनपथांचा काही एक संबंध नाही. आपल्या समाधानाचे जितक्या प्रमाणाने हित असेल तितक्या प्रमाणाने आपले शरीर, शील, समाधानरूपी संपत्ती खर्च करावी. जीवनपथास धरून आपण जर कर्म केले नाही तर आपली स्थिती वेड्यापेक्षाही कठीण होईल.

स्थाल्यां वैडूर्यमय्यां पचति तिलखलीमिन्धनैश्चन्दनाद्यैः ।
सौवर्णे लांगलाग्नैर्विलिखति वसुधामर्कमूलस्य होतोः ।।
छित्या कर्पूरखण्डा न्यृतिमिह कुरुते कोद्रवाणां समन्तात् ।।
प्राप्येमां कर्मभूमि न चरति मनुजो यस्तपो मन्दभाग्यः ।।

जो मनुष्य कर्मभूमीला प्राप्त होऊन व्रत आचरीत नाही तो रत्नजडित भांड्यामध्ये तिळाची पेंड घालून खाली मलयपर्वतावरील चंदन हे सर्पण लावून ती पेंड शिजविणा-या ह्या मनुष्याप्रमाणे किंवा रुईची मुळी काढण्याकरिता सोन्याच्या नांगराचा उपयोग करणा-या मुलाप्रमाणे, किंवा कोद्रवाच्या भोवती कापराचे आळे करणा-या मनुष्याप्रमाणे मूर्ख आहे. जो मंदभागी आहे तो कर्म कोणते, कर्माचे काय महत्त्व आहे हे समजल्यावरही त्या संधीचा दुरुपयोग करतो. ह्याकरिता आपण नेहमी भजन केले पाहिजे. भजन म्हणजे नुसते टाळ कुटीत बसणे नव्हे तर भजन म्हणजे आपल्या मनाला जे उच्च वाटले त्या आदर्शाचा पाठलाग करणे होय. असे भजन करून आपले उद्दीष्ट मनाला कळले अशी जरी खात्री झाली तथापि आदर्शाच्या बाजूने एक अडचण आहे ती कोणती म्हणाल तर –
आवडतो प्रिय परी गवसेना ।।धृ।।
स्वजनाहुनि प्रिय देह आपला ।
तोहि विटे परि आपण विटेना ।।
ज्यावरी धांवति इंद्रिय मन ही ।
सर्वही पाहुनि आपण दिसेना ।।
श्रीगुरुदासा अनन्य घडे जरी ।
अनुभवतंतू कधीही तुटेना ।।

आपणास आदर्श प्रिय वाटतो पण तो गवसत नाही. आपल्या स्वजनाहून प्रिय असा देह विटतो पण आदर्श विटत नाही. आपल्या सर्व गात्रांचे भाव ईश्वर पाहातो पण तो स्वतः काही दिसत नाही. असे जरी आहे तरी आपण निराश होता कामा नये. एका आदर्शाने दुसरा आदर्श मिळतो. हिमालय पर्वतावरची सर्व शिखरे एकदम दिसत नाहीत. एक चढून गेल्यावर दुसरे, दुसरे चढल्यावर तिसरे दिसते. ह्याचप्रमाणे आदर्शाचीही गोष्ट आहे. डावपेच नसेल तर आपला अनुभवतंतू कधी तुटत नाही.

प्रेम पियाला जो पिये शीस दक्षिणा देय ।
लोभी शीस न देसके नाम प्रेमका लेय ।।
जो घट प्रेम न संचरे, सो घट जान मसान ।
जैसी खाल लुहारकी, श्वास लेत बिन प्राण ।।

ज्याला प्रेमाची गोडी लागली आहे तो प्रेमाकरिता आपले डोकेही कापून देण्यास तयार असतो, पण ज्याला ती गोडी नसते तो नुसते प्रेमाचे नाव घेत बसतो, अनुभव यावयास प्रेमाचा प्याला प्यावयास पाहिजे. नाही तर लोहाराच्या भात्याप्रमाणे प्राणाशिवाय नुसता श्वास घेणारी आम्ही यंत्रे होऊ. केशवस्वामी सांगतात-

ऐसी फकिरी नही रे भाई । ये तो सालिम बेशरमाई ।।धृ.।।
चेलेके घर हात पसारे । दुनियादारकु मानत प्यारे ।।
मै घर लडके मनमे घरना । बाहेर निजाम रोजे करना ।।
कान खोलकर केशव बोले । गाफिल अलबत खावे झोले ।।

चेल्याने फकिराजवळ भिक्षा मागावयाची, ती हल्ली संध्याकाळी फकिरांची गर्दी चेल्यांचे घरी दृष्टीस पडते. बाहेरून परमार्थ पण आतून स्वार्थ बरा नव्हे, ह्याकरिता तू आपल्या बुद्धीला संतुष्ट करून आपले हित साधून घे व खालीलप्रमाणे ईश्वराची प्रार्थना कर –
प्रभू मज देई तुझी खरी शांति ।।धृ.।।
जगशांतीने मन मळमळते ।
होत असे मज वांति ।।
तव शांतीने बहु सुख वाटे ।
नेई वरी ती अंती ।।
शांति दे स्थिर करि मन माझे ।।
काढ मनाची भ्रांति ।।
शांति आपुली दिली त्वां ज्यांना ।
काय तयांची कांति ।।

आपला व खालील प्राण्यांचा संबंध

मुलांनो, आमच्यापेक्षा खालील प्राण्यांस बुद्धी नाही, अक्कल नाही असे आम्ही नेहमी मोठ्या तो-याने बोलत असतो. पण, आज मी तुम्हांस ह्या प्राण्यांबद्दल दोन तीन गोष्टी सांगणार आहे. त्यासंबंधाने तुम्ही आपल्याशीच विचार करा.

डेव्हन पोर्ट शहरी एके दिवशी मी आपल्या खोलीत वाचीत बसलो होतो. जवळच घरचे मांजर घुरघुरत बसले होते. काही वेळाने त्यास बाहेर जावेसे वाटले. पण दार घट्ट झाकले होते. ह्या देशात थंडीमुळे घराची सर्व दारे आणि खिडक्या सुमारे ६ महिने बंद ठेवावी लागतात. ते दोन तीनदा ओरडले. पम माझे लक्ष तिकडे गेले नाही. शेवटी मी जेव्हा तिकडे पाहिले तेव्हा मांजर आपल्या पायांवर ताठ उभारून मजकडे पहात पहात दाराच्या कडीकडे आपले रेशमी हात पोहोचविण्याचा प्रयत्न करू लागले. एवढी खूण मला पुरे झाली. मी दार उघडल्यावर मांजर मुकाट्याने बाहेर चालते झाले ! बोलता आले असते तर मांजर ‘थँक यू’ म्हणून आभार मानल्याशिवाय राहते ना !  

पण एवढ्यावरून सर्वच प्राणी ह्या मांजरासारखे मुके आहेत असे समजू नका. थोड्या वर्षांपूर्वी तुम्हा सवतःला जितके बोलता येत होते त्यापेक्षा अधिक व जास्त स्पष्टपणे आणि तेही इंग्रजीत माझ्याशी एक पक्षी बोलला त्याची हकीकत अशी :-

स्कॉटलंड देशाची राजधानी एडिंबरो ह्या शहराजवळ ‘फर्थ ऑफ फोर्थ’ नावाच्या खाडीवर एक भला जंगी पूल बांधला आहे. तो पाहाण्यास मी एके दिवशी गेलो होतो. पाहून झाल्यावर पुलाखालच्या खेड्यातील एका गृहस्थाने मला चहाला बोलाविले. कोणी नवीन पाहुणा घरी आल्यास त्याची आधी घरातील सर्व मंडळींशी शिष्टसंप्रदायाप्रमाणे हात हालवून ओळख करून देण्याची इकडे (फुट नोट – सुबोध पत्रिका ता. ५-१०-१९०२) चाल आहे. पण, ह्या वेळी घरातील सर्व मुली बाहेर गेल्या असल्यामुळे घरधनिणीने आपला आवडता पोपट मजपुढे आणिला. पोपटबुवांची मुद्रा गंभीर आणि अति संभावित दिसली. पुढे आल्याबरोबर पॉलपंतानी मला ‘हाऊ डू यू डू’ (कसे काय आहे ?) असे इंग्रजीत स्पष्ट कुशल विचारले आणि लगेच आपला उजवा पंजा पुढे केला ! ही असाधारण सभ्यता पाहून मी जरी चकित झालो होतो, तरी आपले बोट स्वारीच्या पंजात घालून त्याच्याशी मला सख्य करावे लागले. आम्ही सर्वजण बसल्यावर पॉलसाहेबही खिडकीतून पुलाचा देखावा पाहत बसले. धनीणीने त्यास गावयास सांगितल्यावर ‘आय हॅव्ह गॉट कोल्ड’ (मला थंडी झाली आहे) अशी थाप ठेवून दिली ! स्वारीस गावयास येत होते की नाही , ह्याची शंकाच होती !  पण त्याच्या गाण्यापेक्षा त्याची थाप ऐकून मला विशेष कौतुक वाटले. शेवटी टेबलावर चहाची तयारी झाल्यावर ‘आय वॉन्ट ए कप ऑफ टी’ (मला एक चहाचा पेला आणा) असे कितीदा तरी म्हटले. निरनिराळ्या देशांच्या चालीरीतीसंबंधाने बोलणे निघून आम्ही मध्ये जेव्हा जेव्हा हासू तेव्हा तेव्हा पोपटही जणू कळल्याप्रमाणे हुबेहूब माणसासारखेच हासे. त्याचे खोटे हासू ऐकून आम्हांला अधिकच हासू येई, तरी तिकडे त्याचाच गोंगाट अधिक ! स्वारी लहरीत आल्यास केव्हा केव्हा पुष्कळ वक्तृत्व दाखविते असे त्याच्या धनिणीने सांगितले.

मुलांनो, खालील प्राण्यांत केव्हा केव्हा दिसणा-या ह्या चमत्कारिक गुणांचे आम्ही घटकाभर करमणुकीपलीकडे विशेष महत्त्व मानीत नाही, का तर ह्यांहून पुष्कळपट मोठे गुण आमच्या स्वतःमध्ये किती तरी आहेत ! बरे असो. मी आता तुम्हांस तिसरी गोष्ट सांगतो.

इंग्लंडच्या उत्तरभागी सरोवर प्रांती हेलव्हेलन नावाच्या एका उंच पर्वतशिखरावर मी एके दिवशी चढत होतो. चढण बरीच कठीण होती. चढून गेल्यावर शिखरावर मला एक सुंदर संगमरवरी शिळा उभी केलेली दिसली. अशा कठीण व एकांत स्थळी कोणातरी थोर साधूचे हे स्मारक असावे असे वाटून मी त्यावरील लेख वाचण्यासाठी जवळ गेलो. लेख पुढील अर्थाचा होता. इ. स. १८०५ साली चार्लस गाऊ नावाचा कोणी गृहस्थ ह्या पर्वतावरून हिडत असताना खाली पडून बर्फात गोठून मरण पावला. त्याचा प्रामाणिक कुत्रा त्याच्या प्रेताचे रक्षण करीत तीन महिने त्या ओसाड डोंगरात होता. शेवटी धन्याची वाळलेली हाडे राखीत असताना हा कुत्रा एका धनगरास आढळला ! ह्या एकनिष्ठ दैवी पशूच्या स्मारकार्थ प्राण्यांची कनवाळू प्रसिद्ध फ्रान्सिस पॉवर कॉबभाई हिने हा सुंदर शिलालेख सन १८९० मध्ये रोविला. ह्या दगडांच्या स्मारकाहून अधिक महत्त्वाचे स्मारक वर्डस्वर्थ कवीने (Fidelity) म्हणजे एकनिष्ठा ह्या नावाने कवितेच्या रूपाने करून ठेविले आहे ! मुलांनो, ह्या भयाण व निर्जन प्रदेशात कडक हिवाळ्याच्या बर्फात तीन महिने ह्या कुत्र्याने आपली उपजीविका तरी कशी केली असेल ! ह्याचे उत्तर वर्डस्वर्थने आपल्या कवितेच्या शेवटी दिले आहे ते असे –

How nourished there through such long time –
He knows that gave that love sublime;
And gave that strength of feeling great;
Above all human estimate !

मुलांनो, तुम्हांस इंग्रजी येत नसेल कदाचित तर वरील ओळींचा अर्थ इंग्रजी जाणणा-या तुमच्या वडिलांस विचारा. आणि नुसता शब्दार्थच नव्हे तर खोल अर्थ—व तो तुम्हांस स्वतःला नीट उमजेपर्यंत वडिलांची पाठ सोडू नका.

चिमुकल्यांनो, ह्या तीन गोष्टी झाल्या. अशा आणखी किती तरी सांगता येतील ! पुष्कळ तुम्ही स्वतःच पाहिल्या असतील, पण त्या तुम्हांला दिसल्या नसतील—म्हणजे कळल्या नसतील. आता तुम्हांला घरातील कुत्री, मांजरे, गोठ्यांतील गाई, घोडे, बागेतील चिमण्या, राघू ह्यासंबंधाने काय वाटते ? त्यांस ईश्वराने केवळ आमच्या काबाडकष्टांकरिता व तुमच्या खेळाकरिताच उत्पन्न केले असेल काय ? ईश्वर आम्हांवर जशी प्रीती करतो तशी त्यांच्यावरही करितो. आम्हांस जसे गुण दिले आहेत तसेच थोडेबहुत त्यांना दिले आहेत, ही गोष्ट आता आम्ही कबूल करावीच काय ! देवाच्या मोठ्या कुटुंबात हे प्राणी आमची लहान भावंडे आहेत असे म्हणण्याची अद्यापि थोडी लाज वाटते नव्हे ! एकेकाळी कमी दर्जाच्या माणसास मोठ्या दर्जाच्या माणसाच्या उपयोगासाठीच केले आहे, असा समज होता, पण आता हा अडाणी समज कमी होऊन सर्व मनुष्यजात एकाच बापाची लेकरे आहोत असे हळूहळू वाटू लागले आहे.

हलक्या मनाच्या मनुष्यास दैवाने संपत्ती मिळाली की तो आपल्या पूर्वीच्या गरीब नातलगांस तुच्छ मानू लागतो. मुलांनो, तुम्ही खालील प्राण्यांशी आपले खरे नाते विसराल तर तुमच्यावरही वरील दोष येईल. तर कुत्र्यामांजरांत तुमचे जे खेळगडी असतील, त्यांच्याशी आतापासून प्रेमाने व गोडीने वागाल ना ?

आनंदवाद

ब्रह्मज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी| तेथे व्हावा पोटी अनुताप||
दगडाहूनि जीव करावा कठीण| अंतरीचा शीण तेव्हा जाय||
मेल्या मनुष्याची न धरिती आस| तैसा हो उदास संसारासी||
तुका म्हणे येथे कराराचे काम| मग सुखधाम जवळीच||

मागील खेपेस आपण नैराश्यवादाचे विवेचन करून तो कसा व्यर्थ आहे आणि आपणांस कसा पटत नाही हे पाहिले. ह्या खेपेस आनंदवादाचे विवेचने करून त्याचे साधन काय आहे ते पाहू. सुदैवाने जे स्वभात:च सुखी, जन्मत:च आनंदी, आणि उल्हासी असे असतात, संसारातल्या कोणत्याही प्रसंगाने ज्यांच्या उपजत सुखमय स्थितीला बाधा येत नाही, अशांना आनंदावर निराळा उपदेश करण्याची गरज नाही. लहान मुलास मद्यपाननिषेधसंबंधी व्याख्यानाची जरूरी नाही, किंबहुना त्यामुळे धोकाच आहे. कारण त्याच्या कोवळ्या मनाला मद्य म्हणजे काय ह्याची कल्पनाही नसते. ती कल्पना कदाचित अशा प्रकारच्या व्याख्यानामुळे येऊन त्याच्या उच्छृंखळ बाळस्वभावानुसार मद्याविषयी अनिष्ट जिज्ञासाही उत्पन्न होण्याचा संभव आहे. तद्वत वरील स्वाभाविक उल्हासवृत्तीच्या लोकांची स्थिती होण्याचा संभव आहे. उलटपक्षी, जे लोक स्वभावत: दु:खी आणि उदास असतात, ज्यांच्या मनाची मूस जणू काय उद्वेगाच्या धातूनेच ओतलेली असते, अशांनाही केवळ असल्या उपदेशापासून विशेष फायदा होण्याचा संभव नाही. त्यांच्याशी उल्हासी माणसाचा निरंतर समागम घडावयाला पाहिजे आणि त्यांच्या आनंदी मित्रांनी मनाचे आकर्षण करून त्यांच्या मनाची मूळ रचना बदलण्याचा सतत प्रयत्नच केला पाहिजे. पण तुम्ही आम्ही साधारण माणसे अशा वरील दोन अपवादक आणि अतिरेकाच्या स्थितीतील नसतो. उल्हास आणि उदासीनता ह्या दोन्ही भिन्न भिन्न स्थितींची परिवर्तने, प्रसंग, समागम आणि अभ्यास ह्यांच्यायोगे आमच्या मनात चालली असतात. तेव्हा अशा साधारण बहुसमुदायासाठीच आजचा उपदेश आहे. असा साधारण माणसाच्या विचारामध्ये जो निराशावाद आलेला असतो तो त्यांना दुस-याच्या विचारामुळे, अनुभवामुळे, दूषित वाङ्मयामुळे, अपुरत्या किंवा खोट्या तत्त्वज्ञानामुळे आलेला असतो. तो घालवावयाचा झाल्यास ज्या कारणांनी तो आलेला असतो त्याच कारणांनी, तो काढला पाहिजे. एकदा एका वेड्याचे मनाने असे घेतले की, आपण मेलो आहो. ह्या भ्रमामुळे त्याने जेवण मुळीच सोडून दिले. त्याचा हा भ्रम एका कुशल डॉक्टराने जाणून तो काढून टाकावयासा त्याने पुढील उपाय केला. सुमारे दहाजणांस आपण मेल्याचा पूर्ण भास त्या वेड्यास करून देण्यास त्या डॉक्टराने सांगितले. त्याप्रमाणे बराच वेळ अगदी मेल्यासारखे पडल्यावर व आपण मेलो आहो अशी त्या वेड्याची खात्री पटविल्यावर हे दहाजण आपआपसांत बोलू लागले, खेळू लागले व काही वेळाने त्यांच्यासाठी भोजनगृहात उत्तम तयारी करून ठेविली होती तिकडे निघाले. हे सर्व त्या वेड्याच्या देखतच चालले असल्यामुळे मृत मनुष्येही आपल्या परीने चालतात, बोलतात व जेवतात असा त्याचा दुसरा भ्रम होऊन त्यामुळे त्याच्या पहिल्या भ्रमाचे निरसन झाले, आणि तोही त्या दहाजणांबरोबर यथेच्छ जेवला. असाच उपाय आम्हांला ह्या वरील दु:खवाद्यासंबंधी करावयास पाहिजे. आम्हांला आमच्यात स्वदेशी वाङ्मयातून व विचारातून आनंदाची बीजे शोधिली पाहिजेत. पण आमचे वाङ्मय एककल्ली असल्यामुळे तसे करणे थोडे कठीण जाईल. तथापि एकच पागोटे असले तरी ते मोठे असल्यास आलटूनपालटून बांधल्यास साजरे करता येते तसाच प्रकार आमच्या वाङ्मयाचा करता येईल. आपण आज नुसत्या तुकारामाच्याच अभंगातून आनंदवाद कसा निघतो ते पाहू.

“हरीचिया भक्ता नाही भय आणि चिंता| दु:ख निवारिता नारायण||”

असे तुकारामाने म्हटले आहे. पण भक्तीच्या ह्या लक्षणामुळे आळस वाढण्याचा संभव आहे असे कोणास वाटेल पण-

“पोशा आळशी पातकी| एक आहे मी त्रिलोकी| ‘व’
झालो कासावीस वेढिलो आळसे| शरीराचा त्रास आला मज||
तुका म्हणे धाडी पाडिले आळसे| तुझे नाम कैसे राहे आता||”

ह्यावरून तुकारामाला आळसाची किती चीड होती ते दिसून येते. दुसरे ठिकाणी तर त्यांनी म्हटले आहे की,

“नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे| आणूनि निराळे द्यावे हाती||
इंद्रियांचा जय साधूनिया मन| निर्विषय कारण असे तेथे||
उपास पारणी अक्षरांची आटी| सत्कर्मा शेवटी असे फळ||
आदरे संकल्प वारी अतिशय| सहज ते काय दु:ख जाण||
स्वप्नीच्या धाये विवळसी वाया| रडे रडतियासवे मिथ्या||
तुका म्हणे फळ आहे मुळापाशी| शरण देवासी जाय वेगी||”

ह्यात तुकारामाने म्हटले आहे की, ‘रडे रडतियासवे मिथ्या’ म्हणजे रडणा-याबरोबर आपण रडणे हे वेडेपणाचे आहे. दुस-याला दु:ख झाले आणि तो आपल्या दु:खाचा अनुभव सांगतो तेवढ्यानेच आपण दु:खी होण्याचे कारण नाही. आपल्या मनामध्ये धीर आणि समाधान ठेविल्यास ईश्वर जवळच आहे. पण तोही मोक्षाचे आयतेच गाठोडे देतो असे नाही. त्याला घोर यत्न केला पाहिजे. प्रथम मन निर्विषय आणि निर्वासन करण्याचा निषेधात्मक यत्न करून नंतर सत्कर्माचा विध्यात्मक यत्न करावयास पाहिजे, म्हणजे दु:ख हे पोकळ आहे असे कळून येईल. अशा प्रयत्नान्ती परमेश्वर आहे आणि तो सुखस्वरूप आहे हे कळून येईल.

झाला प्रेतरूप शरीराचा भाव| लक्षियेला ठाव श्मशानीचा||
रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया| म्हमती हायहाय यमधर्म||
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप| उजळीला दीप गुरूकृपा||”
ह्यामध्ये बौद्धाचे निर्वाण,
“आपुले मरण पाहिले म्यां डोळा| तो झाला सोहळा अनुपम्य||
एकदेशी होतो अहंकारे आथिला| त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा||”
ह्यामधील ब्रह्मवाद्यांचा अभेद साक्षात्कार,
“सरले आता नाही|न म्हणे वेळ काळ काही||
विठ्ठल कृपाळु माउली| सदा प्रेम पान्हायेली||
शीण न विचारी भाग| नव्हे निष्ठुर नाही राग||”

ह्यामध्ये ईश्वरवादाचे रहस्य सांगितले आहे. पण हे तिन्हीही प्रकारचे ब्रह्मज्ञान झाले तरी शेवटी तुकाराम म्हणतात की त्याच्या साक्षात्काराला प्रयत्न हे मुख्य कारण आहे. त्या केवळ लेकराच्या गोष्टी नव्हेत. ते कराराचे काम आहे आणि अशा करारानेच सुखाचे माहेरघर आपल्या जवळ आहे, ती आपली सहज स्थिती आहे असे कळून येणार आहे, तर आपल्या दु:खाची कारणे एक तर दुस-यांनी सांगितलेले दु:ख किंवा आपला आळस हीच होत. ह्या दोहोंचा त्याग करून आपण सुखी आहो हे समजून घेतले पाहिजे.

आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज

एकादा धाडसी पुरूष फार दूरच्या प्रवासास निघाला असता त्याच्या मनाची दोन प्रकारची स्थिती होते. एका बाजूने घरदार, बायकामुले, शेतीभाती ह्यांकडे ओढा लागतो. आजपर्यंत मिळविलेला लौकिक आणि केलेली लोकसेवा ह्यांत त्याचे मन गुंतते. दुस-या बाजूस ज्या दूरच्या प्रदेशी त्याला जावयाचे असते तेथील अनुभव, सुखे आणि कर्तव्ये, तेथील नवीन संपादणी ह्यांच्याकडे त्याचे मन ओढ घेते. ज्या ज्या मनाने त्याचा प्रवास अधिक लांबीचा आणि मार्गात अधिक विघ्ने असतील त्या त्या मानाने त्याच्या मनाची ही द्विधा वृत्ती अधिकाधिक जोरावते. व्यक्तीची ही जशी स्थिती होते, तशीच नवीन सुधारणेच्या मार्गाने जाण्यास निघालेल्या एकाद्या जुन्या जागृत राष्ट्राची स्थिती होते. आपले भूतकालचे वैभव, पुराण ग्रंथ, प्राचीन पुरूष, धर्मशास्त्रे आणि वाडम्य इत्यादिकांकडे त्या राष्ट्राचे लक्ष लागते. सुधारणेच्या मागे लागून स्थित्यंतर करण्यापूर्वी आपल्या प्राचीन संपादणीतून काही तरी निष्पन्न होणार नाही काय? ह्याच आशेने ते एका बाजूने त्यातच घोटाळ रहाते. दुस-यापक्षी ह्या सर्व जाळ्यातून आपला पाय काढून घेऊन त्याच्या भोवती नवीन विचार, नवीन विश्वास, ताजी आशा आणि ताजा दम ह्यांचे जे वातावरण पसरलेले असते, त्यातून दूरवर दिसणा-या नवीन ध्येयाकडे ते धाव घेते. व्यक्तीच्या बाबतीत एकाच मनाची द्विधा वृत्ती होते, पण राष्ट्रात निरनिराळे पुढारी आणि त्यांचे अनुयायी ह्या दोन भिन्न वृत्तींचे द्योतक असतात, इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळां प्रगतीच्या मार्गाने धावणा-यांचाही पाय वेळोवेळी मगे घेतो आणि पुराणप्रिय लोकही वेळोवेळी पुढे सरसावतात. ह्याप्रमाणे पुढे सरण्याची आणि थांबून रहाण्याची अशा दोन भिन्न भावना एकाच वेळी होतात. ब्राह्मसमाज ही आमच्या राष्ट्राची वर सांगितल्यापैकी पहिली भावना होय. त्या समाजाची स्थापना अथवा ह्या भावनेचा उदय प्रथम बंगाल्यात होऊन आता ८१ वर्षे पूर्ण झाली म्हणून ह्या समाजाचा ८१ वा महोत्सव ठिकठिकाणच्या ब्राह्म अथवा प्रार्थना समाजामध्ये साजरा होत आहे.

ह्याप्रसंगी आमचे राज्य आधुनिक युगाच्या वातावरणात हालत आहे आणि ज्याचे नवीन नवीन संस्कार त्याच्यावर घडत आहेत, त्या आधुनिक युगाची एक दोन लक्षणे काय आहेत ते आपण पाहू, म्हणजे ती लक्षणेच आमच्या ब्राह्मसमाजाची आद्यतत्त्वे होत हे पुन: निराळे सांगण्याची गरज रहाणार नाही. ज्यांना ज्यांना ह्या लक्षणाचा परिचय घडलेला आहे व ज्यांच्यावर त्यांचा संस्कार घडून ते जाणूनबुजून पुढे पाऊल टाकीत आहेत ते सर्व ब्राह्मधर्मानुयायीच म्हणावयाचे. मग त्यांचा संबंध ब्राह्मसमाजाशी जडलेला असो वा नसो. उलटपक्षी जे केवळ सृष्टिक्रमानुसार ब्राह्मसमाजामध्ये जन्मले आहेत आणि केवळ चालीच्या ओघाने त्यांच्यावर यद्यपि समाजाचे सोळाही ‘संस्कार घडले आहेत पण ज्यांना वरील लक्षणांचा परिचय आणि प्रत्यय प्रत्यक्ष घडलेला नाही ते ब्राह्म नव्हेत.’

मानवी इतिहासात जी निरनिराळी युगे झाली आहेत ती काही तरी कालाचे भाग आहेत असे नव्हे. ती प्रत्येक काही विशिष्ट लक्षणान्वित असतात. आधुनिक युगाचे पहिले लक्षण विश्वरूपदर्शन होय. ते अर्जुनाला कृष्णाने कसे दाखविले ह्याचा सुंदर उल्लेख गीतेमध्ये आहे.

अनेकबाहूदरवक्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वताSनंतरूपम्|
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्||

ह्यावर ज्ञानेश्वरांनी सुंदर मराटी भाष्य केले आहे ते असे:-

हे असों स्वर्गपाताळ| की भूमि दिशा अंतराळ| हे विवक्षा ठेली सकळ| मूर्तिमय देखतसे|| तुजवीण एकादियाकडे| परमाणूहि एतुला कोंडे| अवकाश पाहतसे परि न सांपडे| ऐसे व्यापिले त्वां|| इथे नानापरी अपरिमिते| जेतुली सांठविली होती महाभूते| तेतुलाही पवाड तुवां अनंते| कोंदला देखतसे|| ऐसा कवणेठायाहूनि तूं आलासि| एथ बैसलासी की उभा आहेसी| आणि कवणीये मायेचीये पोटी होतासी| तुझे ठाण केवढे|| तुझे रूप वय कैसे| तुज पैलीकडे काय असे| तूं कायिसयावरी आहासि ऐसे| पाहिले मियां|| तव देखिले जी अवघेची| तरी आतां तुझा ठाव तूंचि| तूं कवणाचा नव्हेशी ऐसाची| अनादि आयता|| तूं उभा ना बैठा| दिधडा ना खुजटा| तुज तळी वरी वैकुंठा| तूंच आहासी|| तूं रूपे आपणयांचि ऐसा| देवा तुझी तुंचि वयसा| पाठी पोट परेशा| तुझे तूं गा|| तुज महामूर्तिचिया आंगी| उमटलिया पृथक् मूर्ति अनेगी| लेइलासि वाने परीची आंगी| ऐसा आवडतु आहासी|| नाना पृथक् मूर्ति तिया द्रुमवल्ली| तुझिया स्वरूपमहाचळी| दिव्यालंकार फुली फळी|| सासिन्नलिया|| ऐसा पवाड मांडूनि विश्वाचा| तूं कवण पां एथ कोणाचा| हे पाहिलें तव आमुचा| सारथि तोचि तूं|| तरि आतां दिठीचा विटाळ गेला| तुवां सहजें दिव्यचक्षू केला| म्हणोनि यथारूपे देखवला महिमा तुझा||

हे विश्वरूपदर्शन हल्लीच्या काळी आम्हां आधुनिकांना मिळालेले आहे. आधुनिक शास्त्रे ही श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आम्हांस दिलेले दिव्य चक्षू होत.

न तुमां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा|
दिव्य ददामि ते चक्षु: पश्य मे यागमैश्वरम्||

ह्या दिव्य चक्षूने आम्ही ईश्वरास यथारूप पाहतो, तथापि आमच्या दृष्टीचा विटाळ त्या निराकार तेजाला होत नाही. त्यामुळे आमची त्याच्यावर विशुद्ध श्रद्धा बसते. आमचा बिनमताचा विश्वास “Creedles faith” आहे. म्हणजे मतमतांतराच्या भानगडीत न पडता आम्ही त्याच्या प्रत्यक्ष दर्शनानेच तृप्त होतो. सर्व विश्वाचा विस्तार पाहून तो विश्वेवर आमचा सारथी आहे, आमचा मार्गदर्शक आहे, आमचा संसारशकट त्याचे हाती आहे, असा आमचा विश्वास होतो. कोणत्याही अनुदार आणि एकदेशीय मतामुळे आमचा हा विश्वेश्वरावरील विश्वास आकुंचित होत नाही. ह्या दर्शनामुळे ह्या युगामध्ये ज्ञानाची द्वारे खुली झाली आहेत, त्यावरील प्राचीन मतांचे दडपम उडून गेले आहे. चहूंदिशी वहाणारे ज्ञानाचे प्रवाह आम्हांस त्याचेच स्वरूप दाखवितात, “किंबहुना आता| तुझे तूंचिं आघवे अनंतां| हे पुढत पुढत पाहतां| देखिले मियां||”

आधुनिक युगाचे दुसरे लक्षण अखंड उल्हास हे होय. बरेच दिवस गोठ्यात बांधलेल्या वासराला बाहेर एकदम उघड्या मैदानात आणले असता त्यास जसा अपूर्व उल्हास होतो आणि ते दशदिशा आनंदाने बागडू लागते, तसे आधुनिक मनुष्यास झाले आहे. आम्ही हवेतून उडू पहातो, लोहमार्ग आणि जलमार्ग ह्यांचीही बंधने आम्हांस नकोशी वाटतात, सर्वांहून प्रिय प्राण ह्याचीही पर्वा न करताना आम्ही अंतराळात हजारो कोस उंच जाऊन प्रवास करू पहातो, पृथ्वीचे कानेकोपरे, अत्यंत शीतल प्रदेशातील तिचे टोक, अत्यंत उष्ण आणि रूक्ष प्रदेशातील तिचा कटिप्रदेश आम्ही शोधून काढीत आहो. तिच्या गर्भात काय आहे, तिच्या भोवताली काय आहे, तिचे घटकावयव काय आहेत, तिचे वय काय, वजन काय, दूरदूरच्या खगोलांचीही वस्तुस्थिती काय, ह्या सर्वांचा शोध आम्ही उल्हासाने करीत आहो. आणि त्यात आमचा नवीन विश्वास, नवीन आशा, आकांक्षा उत्तरोत्तर बळावतच आहेत. नुसत्या अध्ययनातच नव्हे तर खेळ आणि विनोद ह्यांमध्येही आम्हां आधुनिकांचा धाडसी उल्हास दिसून येत आहे. केप कॉलनीपासून कैरो शहरापर्यंत आफ्रिकेच्या निर्जन प्रदेशातून मोटार गाड्यांची लौकरच एक शर्यत होणार आहे असे ऐकतो. सहारासारखी अरण्ये, दाट जंगले, मोठ्या नद्या आणि सरोवरे, ही सर्व उल्लंघून ही शर्यत मारली जाणार आहे! असा हा आधुनिक उल्हास; विश्वरूपदर्शनाचे हे आवश्यक पर्यवसना; ह्यास कोणी आधुनिकांचा जडवाद असे म्हणतात. पण खरे पहात असे म्हणणा-यांचाच हा जडवाद आहे.

तिसरे लक्षण सार्वत्रिक परस्पर सख्य हे होय. अनेक राष्ट्रे, अनेक भाषा, अनेक चाली आणि धर्म ह्यांचा प्रत्यक्ष एकमेकांशी संबंध जडू लागल्यामुळे हल्लीच्या काळी पृथ्वीवर अपूर्व स्नेहसंबंध अनुभवास येऊ लागला आहे. सत्याची सार्वत्रिकता आता जशी सिद्ध होत आहे, तशी पूर्वी कधी झाली नाही. त्यामुळे जातिजातीतील तिरस्काराची भावना आता अगदी संपुष्टात येऊ लागली आहे. कोणी म्हणतील की अद्यापि जातिमत्सर आणि जातिद्वेष पृथ्वीवर वाढत आहे, आणि ह्यास प्रत्यंतर पहावयाचे असल्यास इंग्लंडात होऊ घातलेली सर्व-जाति परिषद (Race Congress) ही होय. जातिमत्सर नसता तर ही परिषदच करण्याचे कारण नसते. पण आमचे तर ह्याचे उलट असे म्हणणे आहे की, ही परिषद जातिमत्सराचा वेग आता ओसरू लागला आहे हे दाखवीत आहे. मनुष्यामनुष्यांमधील दुजाभावाचा पूर जो आजपर्यंत भरून वहात होता, त्याला आता ओहोटी लागली, आणि तो लवकर नाही, तरी काही काळाने आटून जाणार. भिन्न भिन्न काळी भिन्न भिन्न लोकांमध्ये सत्याचा, शीलाचा आणि स्नेहाचा आविर्भाव होत आला आहे. ही भावना आता बळावून सर्व धर्मामध्ये परस्पर सख्य जडत चालले आहे. युरोप, अमेरिका ह्या ठिकाणी आजपर्यंत उदार धर्माची माणसे आणि संस्था जे परधर्मातील सत्यशोधनाचे काम करीत होत्या ते आता गेल्या वर्षी एडिंबरो आणि ह्या वर्षी अलाहाबाद येथे भरलेल्या जुन्या ख्रिस्ती आणि हिंदुधर्माच्या परिषदेने चालविलेले आहे. हे आधुनिक युगाचे विशिष्ट लक्षण आणि अपूर्व महिमा होय.

ह्याप्रमाणे विश्वरूपदर्शन आणि तज्जन्य अकलुषित विश्वास, अखंडित उल्हास आणि सार्वत्रिक स्नेह ही आधुनिक युगाची तीन लक्षणे, हीच आमच्या ब्राह्मसमाजाची तीन आद्य तत्त्वे होत. आमच्या राष्ट्रात ब्राह्मसमाजाशिवाय इतरही समाज, राष्ट्रहिताची कामे करीत आहेत. आर्यसमाजाचा देशाभिमान, थिऑसाफीची सूक्ष्म विद्या, आणि रामकृष्ण मिशनचे वैराग्य ह्या निरनिराळ्या तत्त्वांच्या द्वारे आमचे हित होणार नाही असे आमचे म्हणणे नाही, पण ही तीन लक्षणे मागील निरनिराळ्या युगांची आहेत. सर्वात्मक भाव, सुस्पष्ट दर्शन आणि वृत्तीचा उल्हास ही आधुनिक युगाची लक्षणे आमच्या राष्ट्रास प्रगतीच्या मार्गाने पुढे ओढीत आहेत, आणि ही प्रगतीची भावना म्हणजे ब्राह्मधर्म होय.

आत्म्याची वसती

विश्रांतीची शांति तुझे पायाविण| न होयचि जाण नारायण||
कोटी कल्पवरी उपाय साधने| केलियाही तेणे सुख नोहे||
सुखाचे जे सुख अखंड अपार| जेथे मुनीश्वर रमताती||
तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना|दावी हो चिद्धना पाउले ती||

गेल्या वर्षाच्या उत्सवामध्ये आत्म्याची यात्रा ह्या विषयाचे विवेचन केले. त्यावेळी कामना आणि कर्तव्यबुद्धी हे जे आत्म्याचे दोन पुरूषार्थ त्यांचे स्वरूप काय आहे हे सांगितले, आणि ते साधीत असताना आत्म्याला श्रम होत असतात, त्या श्रमातून विश्रांती कोठे मिळेल ह्याचाही शेवटी उल्लेख केला. आत्मा हा असा कायमचा यात्रेकरू आहे, ह्याला श्रमाशिवाय दुसरी अवस्थाच नाही हे खरे असे तर मोठी कठीण स्थिती होईल. आम्ही ब्राह्म आत्म्याची जी अनंत उन्नती मानतो तिचा अर्थ असा नव्हे की आत्म्याची निरंतर परिश्रमाचीच अवस्था आहे. तसे नसता ह्याला मधूनमधून विसाव्याचेही स्थान आहे. श्रम आणि विश्रांती अथवा यात्रा आणि वसती, किंबहुना बंधन आणि मोक्ष ह्यासंबंधीच्या इतरांहून आमच्या कल्पनेचा निराळेपणा इतकाच की, इतर ह्या अवस्था एकामागून एक येतात असे मानतात, म्हणजे आत्मा काही काळ बद्ध राहून पुढे कायमचाच मुक्त होतो, एक जन्म असो किंवा ८४ लक्ष योनी असोत, ती यात्रा संपल्यानंतर तो कायमच्या वसतिस्थानाप्रत जातो, अशी इतरांची समजूत आहे. आम्हांस असे वाटते की पुरूषार्थाचे श्रम आणि ‘विश्रांतीची शांती’ ह्या आमच्या अवस्था आलटून पालटून पुन: पुन: होतात व येणेप्रमाणे आत्म्याची उन्नती अनंतकाळ चालू असते.

आता आपण आत्म्याच्या वसतीविषयी विशेष विचार करू या. व्यवहारातील आमचा अनुभव असा आहे की घराबाहेर पडल्याबरोबर आम्हांला नुसते शारीरिकच नव्हे तर मानसिक श्रम आणि चिंता उत्पन्न होतात. जंगलात गेलो तर पायात काटे बोचतील काय? वन्य पशू आपणांस खातील काय? अशी भीती असते. शहरात फिरावयास गेलो तर आपला पेहराव नीटनेटका आहे की नाही, चालीरीती आणि सभ्यतेचे नियम आपणांकडून पाळले जातात की नाही ह्याची चिंता असते. सभेत बसून बोलत असलो तरी आपली भाषा शुद्ध आहे की नाही, तिचे प्रघात योग्य आहेत की नाहीत, हे वेळोवेळी पहावे लागते. मनातील भाव गैरसमज न होता दुस-यास कळावे म्हणून अनेक वेळां केवळ औपचारिक रीतीने आम्हांस माफी मागावी लागते, सभेचे आभार मानावे लागतात. एकूण ह्या प्रकारे नेहमी चिंता आणि श्रम होत असतात. पण तेच आम्ही आपल्या वसतिस्थानी म्हणजे घरी बसलो असताना आम्हांला अगदी मोकळे वाटते, घरी कसेही असलो, कसेही बसलो, हसलो की रूसलो ह्याची काही काळजी घ्यावी लागत नाही. हा ऐहिक जीवनातल्या वसतिस्थानाचा महिमा.

आता आमच्या आध्यात्मिक जीवनातही अशा वसतिस्थानाची गरज भासते. शरीराला जसे आमचे घर, तसेच आमच्या आत्मारूपी पक्ष्याला कोठेतरी घरटे आहे काय की, ज्यात तो मधूनमधून विराम पावेल? आत्म्याच्या अनंत उन्नतीचा असा अर्थ समजावा काय की त्याने नेहमी अंतराळामध्ये फडफडतच रहावे? केवळ नीतीच्या जगामध्ये हे घरटे नाही. नीती म्हणजे निरनिराळ्या आदर्शांच्या मागे लागून आम्ही करतो ते प्रयत्न. ते श्रमाचेच जग. नीतीच्या पलीकडे हे घरटे कोठेतरी असावयास पाहिजे. केवळ नीतीने म्हणजे शुभ प्रयत्नाने मानाची आणि आत्म्याची भूक भागत नाही, निदान ‘विश्रांतीची शांती’ तरी मिळत नाही. ह्या शांतीचे एकच स्थळ आहे. जसे आपल्या शरीरामध्ये जीवचैतन्य, त्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये विश्वचैतन्य नांदत असून जीवचैतन्य अल्प प्रमाणावर जसे शुभ प्रयत्न करीत आहे त्याप्रमाणेच ते विश्वचैतन्यही अवीट अमर्याद प्रमाणांनी शुभ प्रयत्न करीत आहे, ह्या गोष्टीचा अनुभव आणि साक्षात्कार हेच जीवाच्या विश्रांतीचे व शांतीचे स्थळ होय.

हीच आमच्या आत्म्याची वसती. हे स्थान नीतिजगाच्या पलीकडचे आहे, नीतिजगाशिवाय त्याजकडे जाण्याला मार्ग नाही हे खरे. नीती ही ह्या शांतीची शिडी आहे, पण नीती ही स्वत:च शांती नाही. नुसते ज्ञान, नुसता भक्तीचा मनोविका, तो कितीही शुद्ध आणि उज्ज्वल असो ह्या दोनच पाय-या ओलांडून ही वसती प्राप्त होत नाही, तर नीतीची कठीण पायरीही ओलांडली पाहिजे. आणि ती नुसती नीतीच आपल्याला पुरे असे म्हणूनही चालत नाही.

जीवचैतन्याचा दुसरा एक असा अनुभव आहे की ह्याच्यावर दोन इतरांनी नेहमी ताण पडलेला भासतो. एक बाहेरून शासनाचे दडपण आणि दुसरे अंत:करणातून प्रेरणेचे प्रोत्साहन. कुटुंबसंस्था, राजसंस्था, समाजसंस्था, धर्मसंस्था ह्या सर्व संस्थांचे आपणांवर नेहमी दडपण असते. हे दडपण नेहमीच अहितकारक असते असे नाही. ह्यामुळेच आपली उन्नती होत असते हे खरे. तथापि त्यांचे दडपण आपल्याला भासत आहे हे खोटे नव्हे. ह्याच्या उलट आपल्या अंत:करणामध्ये अशी एक प्रवृत्ती आहे की आपण ह्या सर्व दडपणांतून आपल्या ध्येयाकडे वाट काढावी. बाहेरचे दडपण आणि आतील प्रोत्साहन ह्या दोन शक्तींचा अनुभव जसा जीवचैतन्यास येतो ही गोष्ट एकदा का आपल्यास पटली म्हणजे आमच्या विश्रांतीच्या शांतीला दुजोराच येतो आणि जीवचैतन्य आणि विश्वचैतन्य  ह्यांमध्ये अनुपम सख्य अनुभविले जाते. मग गेल्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे:

तो हरि सापडला सापडला|मोठा लाभ जाहला||
ज्याते स्मरता मीपण जाय| आत्मा प्राण विसावा माय||

ह्या वचनातील आप्तपुरूष आपणाला भेटून आपणास घरच्यासारखी शांती मिळते.

पण आता असा प्रश्न उदभवतो की वर सांगितलेले जीवाचे जे लक्षण यत्नशीलता त्या लक्षणाने युक्त अशी विश्वामध्ये एकादी शक्ती आहे किंवा नाही? मनुष्यजातीपुढे असलेल्या तत्त्वज्ञानाच्या पुरातन प्रश्नांपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून तत्त्वज्ञानाची आज कोठवर मजल येऊन पोहोचली आहे त्याचे निरीक्षण करू. हा विचार करीत असताना पाश्चात्य तत्त्वज्ञान, पौरस्त्य तत्त्वज्ञान, प्राचीन तत्त्वज्ञान, अर्वाचीन तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या भेदाकडे फारसे लक्ष पुरवू नये. एकंदरीत स्थूलमानाने मनुष्याची विचारसरणी कशी वाहत आली आहे हे ध्यानात घेऊन आज काय ह्या बाबतीत विशेष शोध झाला आहे हे पहाणे प्रस्तुत प्रसंगी युक्त होणार आहे.

पौरस्त्य देशात उपनिषदे, षड्दर्शने आणि बुद्ध ह्यांच्या काळई आणि पाश्चात्य देशात सॉक्रेटिस व प्लेटो ह्यांच्या काळई मानवी तत्त्वज्ञानामध्ये जो नवीनपणा होता तो पुढील मध्ययुगामध्ये राहिला नाही. सृष्टीचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेऊन वर निर्दिष्ट केलेल्या काळातील ऋषींनी आपली तत्त्वमीमांसेची इमारत रचली आणि पुढे त्याच पायावर सृष्टीशी प्रत्यक्ष संबंध न ठेवता आणि तिच्याशी नवीन परिचय करून न घेता पुढील तत्त्ववेत्त्यांनी स्वकपोलकल्पित तर्कवितर्काच्या जोरावरच मीमांसा केली. त्यामुळे त्यांच्या मीमांसेचा परिणाम म्हणण्यासारखा काहीच झाला नाही. अलीकडे आधुनिक शास्त्रांचा प्रसार होऊन सृष्टीच्या अनेक नवीन चमत्कारांचा परिचय झाल्यावर तत्त्वमीमांसेला एक नवीनच वळण लागू लागले. प्रथम प्रथम ह्या नवीन वळणाचा परिणाम मनुष्याच्या उपजत श्रद्धाशक्तीच्या उलट होऊ लागला. पण आधुनिक शास्त्रांचा पाया आता बळकट बसल्यामुळे हल्लीच्या मीमांसेला अधिक पूर्ण स्वरूप येऊ लागले आहे. ह्या गोष्टीची साक्ष आज युरोपात नाणावलेल्या तत्त्ववेत्त्यांचे शिरोमणी फ्रान्स येथील बर्घसन आणि जर्मनीतील ऑयकेन ह्यांच्या विचारसरणीत स्पष्ट दिसून येत आहे. कँट, हेगेल ह्यांच्यापेक्षाही ह्या तत्त्ववेत्त्यांच्या विचारसरणीचा आधुनिक शास्त्रीय शोधांशी अधिक निकट संबंध असल्यामुळे ह्यांच्या विचारात कँट, हेगेलपेक्षाही अधिक ताजेपणा दिसून येतो. इतकेच नव्हे तर कँट, स्पेन्सर इत्यादिक निश्चित ज्ञानवाद्यांपेक्षा ह्यांच्या विचारसरणीत अधिक खोलपणाही दिसून येत आहे. त्यामुळे ह्यांच्या विचारांचा परिणाम विचारशील समाजावर जितका आणि जसा होत आहे, तितका आणि तसा आजवर कोणाच्याही विचारसरणीचा झाला नाही. आता स्पेन्सरच्या विचारांचा पगडा सुशिक्षित लोकांवर अद्यापि असलेला क्वचित दिसून येतो हे खरे, तथापि त्याच्या परिणामाचे निराकारण करून शिवाय नवीन परिणाम ज्याअर्थी ह्या आधुनिक तत्त्ववेत्त्यांचे घडत आहेत त्याअर्थी ह्यांचे विचार सर्वांपेक्षा अधिक परिणामकारी आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. ह्या दोन तत्त्वज्ञान्यांपैकी ऑयकेनपेक्षाही वर्गसनच्या विचारांचा प्रसार सुशिक्षित लोकांमधअये अधिकच झपाट्याने होत आहे. म्हणून त्याच्या विचारसरणीतील मुख्य एक दोन मुद्यांचे आज आपल्या विषयाला अनुसरून अवलोकन करू. ती विचारसरणी मुख्यत्वेकरून त्याच्या “Creative Evolution” ह्या पुस्तकामध्य निर्दिष्ट केलेली आहे. जडसृष्टी, वनस्पतिसृष्टी, प्राणिसृष्टी आणि मनुष्यसृष्टी ह्या चार सृष्टींचे खोल आणि मार्मिक निरीक्षण करून बर्गसन ह्याने असा सिद्धांत काढलेला आहे की, विश्वामध्ये पसरलेल्या अनंत प्रकृतीशी काही एक अज्ञात शक्तीची एकसारखी झटापट सुरू आहे. ह्या मूळ शक्तीला त्यांनी आपल्या ग्रंथात “Vital Impulse” असे म्हटले आहे. वनस्पती, प्राणी आणि मनुष्यकोटी हे ह्या शक्तीचे तीन निरनिराळे फाटे आहेत. ज्याप्रमाणे एकाद्या बोगद्यात लावलेला सुरूंग फुटून बाहेर येण्याविषयी वाट शोधीत असतो, आणि दोन तीन ठिकाणी प्रयत्न करून शेवटी एका बाजूने येतो, त्या रीतीने मनुष्यकोटीच्याद्वारा ह्या मूळ शक्तीने प्रकृतीच्या अभेद्य दडपणातून बाहेर वाट काढली आहे. प्रकृतीशी अनंतकाळ झगडत असताना जरी ह्या मूळ शक्तीस मनुष्यकोटीच्याबाबतीत थोडेबहुत यश आले आहे, तरी मनुष्यामध्ये दिसून येणारी जी संवेदना किंवा जाणीव ती खालील कोटीमध्येही अपरिपक्व दशेत बीजरूपाने आहेच. मनुष्याचा मेंदू हा ह्या जाणीवेचे अवयव किंवा अधिष्ठान आहे. म्हणून तेवढ्यावरून मेंदू हीच जाणीव नव्हे. त्यावरून जेथे मेंदू नाही तेथे जाणीव नाही, असे म्हणता येत नाही. पचनक्रियेचे अवयव जे पोट, ते वनस्पतीमध्ये नसते, तरी झाडातून पचनक्रिया चालू असतेच. त्या विशिष्ट अवयवाचे कार्य झाडाच्या सर्व अंगात चालू असते. पचनक्रियेप्रमाणेच अधिक स्थूलदशेत झाडामध्ये जाणीवही असतेच. मात्र तिची वाढ वनस्पतीत खुंटलेली असते. पुढील कोटीत त्या जाणीवेचे दोन फाटे फुटलेले दिसतात. खालील प्राण्यांत उपजतबुद्धी (Instinct) आणि मनुष्यमात्रांत विवेकबुद्धी (Intelligence) अशी हिला निरनिराळी नावे देता येतील. पण उपजतबुद्धी ही जाणीवेची प्रथम पायरी असे जे काही तत्त्ववेत्ते म्हणतात ते बरोबर नाही. ह्या दोन भिन्न भिन्न शाखा आहेत. एक दुसरीची पूर्व तयारी नव्हे. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांपैकी मनुष्यामध्ये दुसरीला पूर्णता आली आहे तर कणा नसलेल्या मुंग्या आणि माशा म्हणजे (Orthropods) प्राण्यांमध्ये विशेषत: पहिलीचा (Instinct) बराच विकास दृष्टीस पडतो. इंग्लंडात मी एकदा स्वत: एका बाईने एका मोठ्या पेटीत मुंग्यांनी बांधलेल्या शहराचे प्रदर्शन केलेले पाहिले, त्या शहरात घरे, रस्ते, पूल वगैरे ह्या लहान प्राण्यांनी उत्तम प्रकारची रचना केलेली दिसून आली. तशी नागरिक रचना आमच्या कित्येक मोठ्या शहरातील म्युनिसिपालिट्यांचीही दिसून येत नाही. उपजतबुद्धी आणि विवेकबुद्धी ह्यांची भिन्न स्वरूपे आणि भिन्न विकास बर्गसनने आपल्या वरील ग्रंथात वर्णिले आहेत. विशेषेकरून त्यांनी १९११ च्या मे महिन्यात बर्मिगहॅम युनिव्हर्सिटीत जीव (Life) आणि जाणीव (consciousness) ह्या विषयावर जे अत्यंत महत्त्वाचे पण सुबोध असे व्याख्यान दिले आहे व जे “Hibbert Journal” ह्या मासिकाच्या गेल्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, त्यांत त्यांनी ह्या विषयाचे फार सुंदर स्पष्टीकरण केले आहे. त्यात त्यांनी जाणीवेच्या विकासाला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. एकदी मोठी नदी पर्वतावरून निघून तिचे निरनिराळे फाटे फुटून जंगालातून, वाळवंटातून वगैरे गडप होतात तरी मुख्य प्रवाह जसा पुढे वाहत जातो, त्याप्रमाणे ही वनस्पती आणि खालील अनेक जीवकोटी ह्यांमधून प्रवास करीत अखेर मनुष्यप्राण्यांमध्येही ब-याच उज्ज्वल रूपाने विकसली आहे. ज्यांना ही विचाराची सरणी पटत असेल त्यांनी बर्गसनच्या ग्रंथांचे लक्षपूर्वक अध्ययन केल्यास मोठा लाभ होईल.

वर सांगितल्याप्रमाणे विश्वचैतन्याचे पर्यवसान केवळ विवेकातच झालेले नाही, तर प्रेम आणि कर्तव्याचाही रूपाने तिचा ह्या मनुष्यकोटीत विकास झालेला दिसत आहे. हिचे अंतिम पर्यवसान कोठे आणि कसे होणार, हिचा मूळ हेतू काय आहे ह्या गोष्टी जरी आपल्या ज्ञानाच्या पलीकडच्या आहेत तरी आजर्यंत हिचे झालेले उत्पादक उत्क्रमण (Creative Evolution) आमच्या डोळ्यांपुढे स्वल्प तरी दिसत आहे. ह्या मूळशक्तीने केलेल्या सर्वच प्रयत्नांत यश आले आहे असे नाही, उलट हिला बहुतेक प्रयत्नांत बर्गसनने म्हटल्याप्रमाणे अपयश आलेले दिसत आहे, तरी हिचा प्रयत्न उत्तरोत्तर जोरावतच आहे. त्याला खंड नाही किंवा तो कायमचा विराम पावण्याचाही संभव दिसत नाही. ह्याप्रकारे आपल्याभोवती विश्वामध्ये आम्हांप्रमाणेच जी एक विराट शक्ती आपले सतत कार्य करीत आहे, तिचे दर्शन झाल्याबरोबर तेच ह्या जीवचैतन्यास विश्रांतीची शांती देण्याला कारण होते. ते दर्शन झाल्याबरोबर नुसती विश्रांतीच मिळते असे नव्हे, तर नवीन प्रयत्न करण्याला हुरूपही येतो. आपल्या मार्गात जे अडथळे येतात किंवा आपल्याभोवती जे दडपण पडते त्यांच्याशी टक्कर देण्याला वरील दिव्य दर्शनाने मिळालेल्या अंत:शांतीमुळे अधिक जोर येतो. आमच्या प्रार्थनासमाजाला ह्याच वरील विश्वचैतन्याचा भरंवसा आहे. तीच आमच्या आत्म्याची वसती.

  1. आत्म्याची यात्रा
  2. आख्यान
  3. अहंकरा नासा भेद
  4. UNITARIANISM IN ENGLAND AND AMECRICA
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
  • 33
  • 34
  • 35
  • 36
Page 32 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी