1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

माझें बि-हाड

डॉ. ग्रेडन  :   इंग्लंडांत परक्यांना राहण्यासाठीं उत्तम व्यवस्था असते.  श्रीमंतांसाठीं व सामान्यांसाठीं निरनिराळ्या दर्जाची हॉटेलें शहरांत, गांवांत आणि प्रेक्षणीय स्थळें असलेल्या रानावनांतून सुद्धां मुबलक आहेत.  शिवाय खाजगी रीतीनें राहण्यासाठीं मध्यम प्रतीचे लोक पाहुण्यांकडून पैसे घेऊन (Paying Guest) आपल्या घरीं वाटेल तितके दिवस सोय करतात.  डॉ. आणि मिसेस ग्रेडन या दंपतीकडे मीं बहुतेक पहिली टर्म घालवली.  मी उशिरां गेल्यानें कॉलेजच्या वसतिगृहांत जागा मिळाली नाहीं.  पण पुढील अनुभवावरून स्वातंत्र्य आणि काटकसर या दृष्टीनें बाहेर राहणेंच बरें वाटूं लागलें.  ग्रेडनसारख्या संभावित कुटुंबामध्यें मला इंग्रजी चालीरीति आणि सभ्यता यांची बरीच माहिती मिळून फार लाभ झाला.  सामान्य हिंदु विद्यार्थ्याला टेबलावर बसून कांटे-चमचे वापरणें, टाय-कॉलर नीट बांधणें वगैरे क्षुल्लक गोष्टीपासून तों संभावित मंडळींमध्यें बोलण्याचालण्याची ढब राखणें व दुसर्‍याचा पाहुणचार करणें, वगैरेपर्यंतची फार खबरदारी घ्यावी लागते.  शिकल्याशिवाय ही खबरदारी शक्य नाहीं.  काटकसरीसाठीं मला हें घर सोडून स्वंतंत्र रीतीनें भाड्यांची जागा घेणें पुढें काटकसरीच्या दृष्टीनें बरें वाटलें.  गरीब स्थितीचें कुटुंब एक सबंध घर घेऊन आपण तळघरांत राहून इतर मजले सभ्य गृहस्थांस भाड्यांनें देऊन आपली गुजराण करतें.  कुटुंबांतील मालकीण (हिला Land Lady असें म्हणतात) बहुतेक अशा प्रकारचा धंदा करते.  पाहुण्याचें जेवणखाण, स्नानाची, कपडे धुण्याची व कांहीं घरगुती व्यवस्थेची जबाबदारी या बाईकडे असते.

भाड्यांची जागा  :  ऑक्सफर्ड वूल्स्टर प्लेस नांवाच्या मध्यम वस्तीच्या भागांत नं. २३ च्या घरांतील पहिल्या मजल्यांतील दोन खोल्या मीं घेतल्या होत्या.  ऑक्सफर्डचा विद्यार्थी, विशेषतः ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून काटकसर संभाळून व्यवस्थेनें व सभ्यतेनें वागणें मला जरूर होतें.  निजावयाची खोली व उठण्याबसण्याची खोली निराळी ठेवावी लागते.  युनिव्हर्सिटींतील बाहेर राहणार्‍या विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटीच्या शिस्तीचा डोळा असतो.  म्हणून अशा घरांना युनिव्हर्सिटीकडून परवाना घ्यावा लागतो.  माझ्या लँडलेडीचें नांव मिसेस पिअर्सन होतें.  मिस्टर पिअर्सन ऑक्सफर्डच्या एका मोठ्या हॉटेलांत वाढप्याचें काम करीत होते.  ह्यांना दोन मुलें व चार मुली होत्या.  माझ्या वरच्या मजल्यांत दुसरा एक पाहुणा होता.  आम्ही दोघे ६ महिन्यांचे वर तेथें राहिलों तरी एकमेकांशीं कधींच बोललों नाहीं.  कारणाशिवा एकमेकांशीं सलगी लावणें हें असभ्य समजलें जातें.

पिअर्सन  :  पिअर्सन हें कुटुंब अत्यंत साधें, गरीब व फार प्रामाणिक होतें.  जातिभेद नाहीं तरी इंग्लंडांत वर्गभेदाचें प्रस्थ फार आहे.  ऑक्सफर्डचा विद्यार्थी आणि त्यांतल्या त्यांत धर्मशिक्षणाचा विद्यार्थी याचा दर्जा इंग्लंडांत फार मोठा समजला जातो.  अमीरउमरावांच्या खालोखाल धर्माधिकार्‍यांचा दर्जा फार मोठा मानला जातो.  प्रसंगविशेषीं मोठमोठ्या लॉर्ड लोकांवरही अशा लोकांचें दडपण पडतें.  ह्या कुटुंबांतील सर्व लहानथोर माणसांनीं मला नेहमीं फारच आदबीनें वागवलें.  म्हणून मला शेवटपर्यंत बिर्‍हाड बदलण्याचें कारण उरलें नाहीं.  सर्वांत वडील मुलगी अँलिस हिच्याकडे पाहुण्यांची सर्व व्यवस्था पाहण्याचें काम होतें.  बोलावल्याशिवाय कोणीही खोलीच्या आंत पाय टाकत नसत.  इंग्लंडांत खोल्यांचीं सर्व दारें उन्हाळ्यांतही नेहमींच लावलेलीं असतात.  कोणी कोणाकडे परवानगीशिवाय आंत येत नाहीं.  पुढें दाट परिचय झाल्यावर मी होऊनच तळघरांतील स्वयंपाकघरांत मिसेस पिअर्सनकडे खेळीमेळीनें जाईं, तेव्हां सर्व कुटुंबाला आपला मोठा सन्मान झाल्यासारखें वाटे.  अँलिसचें वय सुमारें बावीस वर्षांचें होतें.  तिच्या पाठीवर विली व फ्रँक असे भाऊ होते.  त्यांच्या पाठीवर नेली, मे आणि मॅगी अशा तीन मुली होत्या.  मॅगी तीन वर्षांची होती.

व्यक्तित्व  :  मी या सर्व मुलांना घेऊन आदितवारीं फिरण्यास जात असें.  अँलिसचा एक मोठा भाऊ वारला होता.  त्याचें थडगें पाहण्यास मीं जावें अशी अँलिसनें एकदां मला सूचना केली होती.  ख्रिस्ती समाजाची स्माशानभूमि देखील फार सुंदर व रमणीय असते.  नाहीं तर आमच्या पुण्याचें ओंकारेश्वर !  एके रविवारीं मी सर्व लहानग्यांसह तें थडगें पाहण्यास गेलों.  थडग्यावरील गुलाबाच्या झाडाला सुंदर फूल आलें होतें.  तें पाहून मीं लहानग्या मॅगीला म्हटलें, ''बाळ, ते फूल घे बघूं !''  ती म्हणाली, ''No Sir !   ते झाल माझ्या आईचें आहे.  तिच्या परवानगीशिवाय मला हात लावतां येत नाहीं.''  हें ऐकून मी मनांत चरकलों.  मॅगी केव्हां केव्हां बोलावल्यावर माझ्या खोलींत येई.  तिला, ''हें टेबल कुणाचें, ही खुर्ची कुणाची'' असे प्रश्न विचारल्यास ''माझ्या आईची'' असें गंभीर उत्तर येई.  'आमची' असे उद्‍गार तिचे तोंडून कधींच येत नसत.  गरीब स्थितींतील लहानग्या मुलीच्या व्यक्तित्वाचे हे उद्‍गार ऐकून इंग्रजांविषयीं मला धन्यता वाटली.

माझें प्राथमिक शिक्षण

घूळपाटी  :   मी ५ किंवा ६ वर्षांचा झालों असतां माझे आजोबा बसवंतराव वारले.  तेव्हांपासून ११ वर्षांचा होईपर्यंतचीं, म्हणजे इ.स. १८७९ पासून १८८४ पर्यंतचीं ५ वर्षे हीं माझ्या प्राथमिक शिक्षणाचीं होतीं.  मला प्रथम एका गांवठी शाळेंत घालण्यांत आलें होतें.  हल्लीं जमखंडीस ज्या घरांत रा. सदाशिवराव पेंडसे वकील राहात आहेत, तेथें ही खाजगी शाळा होती.  पंतोजीचें नांव हरिपंत फडके किंवा असेंच कांहींसें होतें.  ह्या शाळेंत फक्त लिहिणें, वाचणें, मोडी अक्षर वळविणें, हस्तलिखितें वाचणें, हिशोब करणें वगैरे केवळ व्यावहारिक साधे विषय होते.  त्या वेळीं संस्थानांत सरकारी शाळा होत्या कीं नव्हत्या हें माहीत नाहीं.  असल्याच तर मला या गांवठी शाळेंत कां ठेवलें तें कळत नाहीं.  निदान इंग्रजी शाळा तरी त्या पूर्वकाळीं नसावी.  शाळा खात्याची घटना त्या वेळीं नुकतीच चालली असावी.  या गांवठी शाळेंत मी प्रथम माझी धुळाक्षरें कशीं शिकलों तें आठवतें.  एक लाकडी फळी सुमारे दीड हात लांब व एक वीत रूंद असे.  तिला आम्ही पाटी म्हणत असूं.  वेळूची एक बारीक लेखणी असे, तिनें या पसरलेल्या धुळींत आम्ही धुळाक्षरें कोरीत असूं.  म्हणूनच मुळाक्षरांना धुळाक्षरें हें नांव पडलें आहे.  ह्या वेळीं दगडी स्लेटींचा प्रचार जमखंडीस दिसत नव्हता.  मला शाळेंत घालण्याचा मुहूर्तसमारंभ झाला.  चैत्री पाडवा, दसरा, पंचमी आणि अक्षय्यतृतीया हे साडेतीन शुभमुहूर्त गणले जातात.  कोणत्याही गोष्टीस सुरुवात करावयाची ती ह्या मुहूर्तावर करतात.  रा. बाळा काणे या नांवाचा एक ब्राह्मण खाजगी शिक्षकाचा धंदा करीत असे.  माझ्या वडिलांनीं त्याला घरीं बोलावून आणून माझ्या शिक्षणाच्या आरंभाचा एक लहानसा विधि करविला.  सोप्यांत दोन पाट मांडून मला व काणेमास्तरांना समोरासमोर बसवून मध्यंतरीं ही धूळपाटी ठेवून तिची पूजा करण्यांत आली.  नंतर शिक्षकांनीं माझा हात धरून पहिला धडा 'श्रीगणेशाय नमः' माझ्याकडून गिरविला.  माझ्या वडील भावाचा हा विधि मला आठवत नाहीं.  माझ्या पाठीवर ८।१० मुलें जरी झालीं तरी तीं बाळपणींच वारलीं.  जनाक्का व तान्याक्का ह्या मुली होत्या व एकनाथ हा शाळेंत जाण्याइतका मोठा होईपर्यंत युगांतरच झालें होतें.  म्हणून हा विधि पुन्हां कधीं आमचे घरीं झाला नाहीं.

मौजीबंधन  :   बाबांना धार्मिक विधि-समारंभाची श्रद्धा होती व आपल्या घरीं पुरोहितास आणवून सर्व संस्कार यथासांग करावेत, असें त्यांना पूर्वीपासूनच वळण लागलेलें होतें.  आमची लग्नें होण्यापूर्वी माझ्या भावाची व माझी विधिपूर्वक मुंज करण्यांत आली.  ह्यावरून आमचें घराणें क्षत्रिय होतें, अशी भावना आमच्या बाबांमध्यें विशेष होती असें दिसतें.  वरील दोन्ही उपनयनसमारंभांच्या वेळीं आजोबा जिवंत नव्हते.  मुंजीच्या वेळीं आजीही जिवंत नसावी.  आमचे लग्नानंतरही एकदोनदां श्रावणीचे दिवशीं स्वतः बाबा व आम्ही दोघे मुलगे, ह्यांचा पुरोहिताला आणून विधिपूर्वक होमहवन करून नवीन यज्ञोपवीत घेण्याच्या थाटाचा समारंभ होत असे, असें मला आठवतें, पुढें दारिद्र्यानें गांठल्यामुळें बाबा उदासीन झाले.  त्यामुळें श्रावणीचे वार्षिक समारंभ बंद पडले.  जमखंडी गांवांत इतर कोणी मराठे अशी श्रावणी करीत नसत.  मी १८९८ इ. सनांत पुणें येथील प्रार्थनासमाजांत सभासद हाईपर्यंत माझ्या अंगावर जानवें हें होतेंच व त्याचा विधि इतर हिंदूंप्रमाणें मी तोपर्यंत थोडाबहुत पाळीत असें.  आमची श्रावणी चालली असतांना होमाचे वेळीं आमचे पुरोहित जे मंत्र म्हणत ते वैदिक असत किंवा पौराणिक असत हें मला माहीत नाहीं.  पण नवरात्रांत रोज आमच्या घरीं नऊ दिवस महापूजा होत असे, त्या वेळीं मंत्र-पुष्पाच्या वेळीं पुरोहित वेदमंत्र म्हणत असत, हें आतां मला आठवतें.  हा मंत्र क्षत्रियांच्या घरीं म्हणण्यासाठीं रचला असावा.  इतक्या जुन्या काळीं जमखंडीसारख्या ब्रह्मणी रिसायतींत आमच्या घरीं क्षत्रिय-ब्राह्मणांचा इतका सलोखा असतांना पुढें पुढें ब्राह्मणब्राह्मणेतर वाद कसा माजला हें आश्चर्य आहे.

प्राथमिक शाळेंत माझा अभ्यास बरा होता.  पण अभ्यासाकडे त्या वयांत लक्ष फारसें न लागणेंच साहजिक होतें.  चौथ्या इयत्तेपासून माझें गणित व भाषा बरीं आहेत, हें शिक्षकाच्या नजरेस आलें.  मोडी अक्षर म्हणण्यासारखें वळणदार नव्हतें.  बाबांनीं आमच्या शाळेंतील अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलेलें मला आढळलें नाहीं.  मराठी चौथी इयत्ता संपल्यावरही एकदम इंग्रजी हायस्कुलांत जाण्यास हरकत नव्हती.  पण मला मराठी पांचव्या इयत्तेंत एक वर्ष घालवावें लागलें.  मराठी शाळेचे हेडमास्तर विष्णुपंत गवंडे ह्यांनीं मला मुद्दाम पांचव्या इयत्तेंत घेतलें.  त्यामुळें मला फायदाच झाला.  मराठी कवितेंत आणि गणितांत त्या वेळच्या मानानें माझी बरीच प्रगति झाली.  पांचव्या पुस्तकांतील कुशलवाख्यान आणि मोरोपंतांच्या धेनुहरणाच्या आर्या ह्यांचा अर्थ व व्याकरण मला चांगलें कळत असे.  कविताही चांगल्या सुरावर मी ऐटींत म्हणत असें.  कोणी शाळा पाहावयास आल्यास माझ्या कविता म्हणून घेत असत.  अशा प्रकारें पंतोजींचा मी लाडका असें.  मोरोपंतांच्या कठीण व संस्कृतमिश्र आर्यांचा अर्थ मी घरींदेखील कोणाला तरी मोठ्या आढ्यतेनें करून दाखवीत असे.  त्यामुळें मी बाबांचाही लाडका झालों.  आपले प्रतिष्ठित मित्र घरीं आल्यास ते मला कविता म्हणून अर्थ करण्यास सांगत.

आक्काची माया  :   माझ्या आईबाबांशिवाय माझ्या आत्येचा मी लाडका होतों.  वडील भावापेक्षांही मजवरच अक्काचें (आमची आई आपल्या नणंदेला अक्का म्हणे, म्हणून आम्हीही तिला अक्काच म्हणत असूं.)  प्रेम कां गुंतावें हा एक प्रश्न आहे.  माझ्या भावापेक्षां मी जरी देखणा नसलों तरी अधिक चुणचणीत असें.  माझ्या भावाला द्यावयाला त्याला अनुरूप अशी मुलगी माझ्या आत्येला नव्हती.  आमच्या घराण्यांत आपली एक तरी मुलगी खुपसण्याची तिची बळकत इच्छा होती.  कांहीं झालें तरी अक्काचें मजवर अकृत्रिम प्रेम होतें ह्यांत संशय नाहीं.  अशांत माझी मराठी शाळेंतली तिसरी इयत्ता पास होऊन मी चौथींत गेलों, तेव्हां अक्काच्या आनंदाला आणि गर्वाला सीमाच नाहींशी झाली.  तिनें लागलीच छोटुसिंगास साखर वाटली.  बिचारी अक्का !  पुढें मी बी.ए.झालों, विलायतेला जाऊन आलों, हें पाहण्यास ती राहाती तर तिनें काय केलें असतें !

अक्काचें मजवर इतकें प्रेम होतें, तरी मी कांहीं फारसा तिचेकडे जात नसें.  कारण मी तिकडे गेलों कीं, ''धोंडीचा नवरा आला'' असा गलबला त्या आळींतील पोरें आणि थोरेंही करीत.  तें ऐकणें मला आवडत नसे.  तरी मुख्य सणाचे प्रसंगीं जावें लागत असे.  दसर्‍याचे दिवशीं सोनें वांटावयाला. संक्रांतीचे दिवशीं तिळगूळ द्यावयाला जाणें भागच होतें.  दसर्‍याचे दिवशीं गेलों म्हणजे अक्काच्या देव्हार्‍यावरच्या सार्‍या कडाकण्या मी खाऊन फस्त करीत असें.  ती तर मी केव्हां येऊन त्या खाईन ह्याची वाटच पाहात बसे.

माझा हट्ट  :  एकदां अक्का कोंकटणूरच्या यल्लामाच्या यात्रेला निघाली होती.  त्या वेळीं मी फार तर ४।५ वर्षांचा असेन.  अक्का आमचे घरीं निरोप घ्यावयाला आली होती.  ती जाऊं लागली तेव्हां तिचेबरोबर यात्रेला जाण्याचा मीं हट्ट घेतला.  कांहीं केल्या हा हट्ट मी सोडीना.  बाहेर रस्त्यापर्यंत मी रडत तिचे मागें लागलों.  तिनें मला उचलून खांद्यावर घेतलें व परत घरीं आणून ती मला सोडूं लागली.  त्या वेळीं मी इतका अनावर झालों कीं, खांद्यावर बसल्या बसल्या मीं मोठ्या आवेशानें पाय झाडला, तो तिच्या पुढच्या दांतांला लागून वरचे दोन्ही दांत तात्काळ पडले आणि अक्काचें तोंड रक्तबंबाळ झालें.  तरी बिचारीला राग आला नाहीं.  उलट ही गोष्ट बाबांना न कळूं देण्याची खबरदारी घेण्याविषयीं तिनें आईची गयावया केली.

माझे सोबती

हायस्कुलांतील माझे शिक्षक व अभ्यास यांविषयीं साधारण आठवणी वर दिल्या.  आतां सोबती व त्यांच्याशीं करमणुकीचे प्रकार सांगितले पाहिजेत.  कारण स्वभाव आणि शील बनण्यांत केवळ पुस्तकी अभ्यासापेक्षां ह्या दोहोंचा परिणाम अधिक होतो.  

माझीं भावंडें  :   माझी इंग्रजी पहिली इयत्ता मला कठीण व त्रासदायक गेली.  त्या वेळीं माझा वडील भाऊ जिवंत होता.  त्यामुळें मला स्वतंत्र सोबती असणें साहजिक नव्हतें.  त्याचे जे सोबती असत त्यांच्याच मागें मागें दुय्यमप्रमाणें मला वागावें लागे.  माझा भाऊ मजवर वडीलपणा गाजवी असें नव्हे.  तो शांत स्वभावाचा होता.  बरेच वेळां मी त्याचें ऐकत नसलों तरी तो समजुतीनें माझ्याशीं वागून मला आपल्याबरोबर नेहमीं ठेवी.  असा मायाळू भाऊ ह्या वर्षी एकदम वारल्यामुळें एकाएकीं उघडा पडल्यासारखें मला झालें.  तोंपर्यंत माझ्या भावाशिवाय मी इतर कोणाशीं मिसळत नसें.  हायस्कुलांत जाऊन मला माझ्या स्वतःचा शोध लागेपर्यंत माझीं भावंडें हेंच माझें मित्रमंडळ होतें.

आमचा वाडा ज्या आळींत होता, तेथें मराठ्यांचीं जीं घरें होतीं तीं अगदीं गरीब व खालच्या दर्जाचीं होतीं.  एखाद्या किल्ल्याप्रमाणें आमचा वाडा किंचित् एकलकोंडा होता.  तशांत माझें प्राथमिक शिक्षण आटोपून मी इंग्रजी शाळेंत जाऊं लागल्यामुळें, आळींतल्या मुलांतच काय पण मोठ्या माणसांमध्येंही माझें महत्त्व वाढत असल्याची जाणीव मजमध्यें दिसूं लागली.  माझ्या भावांत अशी अहंता नव्हती.  समजुतदार असल्यामुळें तो भोंवतालच्या लोकांत अधिक मिसळत असे.  अशा वेळीं तो मला एकाएकीं सोडून गेला.  इकडे शाळेंत नव्या इंग्रजी विषयाशीं माझें नीट जमेना.  त्यामुळें मी त्रासलेला व बहुतेक दुर्मुखलेला असें.  माझें पहिल्या इयत्तेंतलें वर्ष इ.स. १८८५ बहुतेक एकलकोंडेपणांतच गेलें.  आळींतील सामान्य लोकांना हीं कारणें कशीं कळणार ?  ते मला गर्विष्ठ समजत.  माझ्या भावाच्या तुलनेनें मी लोकांत जवळजवळ अप्रियच होतों.  

माणूसघाणेपणा :  मी लहानपणीं फार लाजाळू असल्यानें लोकांत न मिसळण्याचा माझा स्वभावच होता.  अद्यापिही मला एकदम एखाद्या समाजांत कारणाविना, किंबहुना अगत्यानें बोलाविल्याविना जाणें आवडत नाहीं.  त्यामुळें अजून केव्हांकेव्हां मजवर गविष्ठपणाचा - निदान मानीपणाचा -आरोप येतोच.  माझ्या आत्येचा कितीही आग्रह असला तरी मी त्यांच्या आळींत कधीं फिरकत नसे.  पण माझा भाऊ मात्र त्या बाजूला फार लोकप्रिय असे.  तो तरुण होता.  माझ्यापेक्षां तो रंगानें उजळ व रूपानें देखणा होता.  बड्यां बापाचा वडील मुलगा आणि स्वभावानें मनमिळाऊ.  मग कां लोकप्रिय होणार नाहीं ?  विशेषतः त्या बाजूच्या तरुण मुली त्याच्यावर फार फिदा होत्या.  मला हें रहस्य त्या वेळीं कळणें शक्य नव्हतें.  म्हणून माझ्या भावाच्या चहाड्यां घरीं येऊन मी आईजवळ सांगें.  आई त्या मनावर घेत नसे आणि भावाला तर मजविषयीं कधीं रागच नसे.  त्यामुळें माझ्या सासूच्या आळींतील लोक मला चहाडगा व मत्सरी म्हणत.  मी जो मुलांशींही न मिसळणारा, तो मुलींत कसा मिसळणार ?  म्हणून त्या मला माणूसघाणा म्हणत.  पुढें तर मी मोठा शिकलों, विलायतेला जाऊन आलों, ब्राह्मणसमाजांत शिरून सुधारणेचा अतिरेक केला, दारिद्र्याचें व्रत घेतलें आणि शेवटीं कुटुंबासह महारामांगांच्या वाड्यांत त्यांची सेवा केली !  ह्यांपैकीं एकाही कारणानें मराठ्यांसारखा मागासलेला समाज मला अद्यापि विक्षिप्‍त समजणें साहजिक आहे.  मग ह्या सर्व कारणांचा कडेलोट करणार्‍या मला जमखंडींतील सर्वच लोक अद्यापि माणूसघाणा म्हणतात ह्यांत नवल कां वाटावें ?  आतां देखील फार दिवसांनीं मी जन्मभूमील गेलों, तर माझ्या घराण्याचा लौकिक जाणून लोक मला गांवांत तरी घेतात.  बाटगा, ख्रिश्चन, बहकलेला समजून ते मला महारवाड्यांत बसवीत नाहींत, ह्यांतच मी भाग्य समजतों !  अर्थात् मराठेतर समजूतदार माणसें -मग ती ब्राह्मण असोत, लिंगायत असोत कीं मुसलमान असोत-मला फार बहुमानाने वागवितात तो प्रकार वेगळा.  जमखंडींतील मराठे तरी मला अद्यापि दूरदूरच करीत आहेत.  

माझा लाजाळू स्वभाव, लोकांत बसण्या उठण्याचा संकोच, माझ्या भावाच्या मृत्यूमुळें झालेला विरह आणि अंगवळणी न पडलेल्या इंग्रजी अभ्यासाचा जाच इत्यादि कारणांमुळें ह्या वेळीं मी फार घुम्या स्वभावाचा झालों होतों.  अशा वेळी एक लहानशी सुंदर गोष्ट घडली ती आठवते.  ती दिसण्यांत क्षुद्र असली तरी माझ्या या वेळच्या अंतःस्थितीवर मोठा मनोरंजक प्रकाश पाडते.

गोड देखावा :  माझा भाऊ वारल्यानंतर फारतर एक दोन महिन्यांतली ही गोष्ट.  त्या वेळीं मी बारा वर्षांचाही नव्हतों व माझी बायको फार तर तीन वर्षांची असावी.  माझी आत्या वरचेवर समाचाराला आमचे घरीं येई.  एकदां तिनें माझ्या या लहानग्या बायकोला लुगडें वगैरे विशेष कांहीं न नेसवितां तसेंच बरोबर आणिलें होतें.  कारण माझें घर जरी माझ्या बायकोचें सासर तरी तिच्या आईचें माहेर होतें.  किंबहुना तीच लहान पोर आईला न कळत अर्धी नागडीउघडी सहज मागें लागून आली असावी.  आमच्या वाड्यांच्या मोठ्या दरवाज्यांतून आंतील लहानशा चौकांत येतांना दारांत एक मोठी गुळगुळीत फरशी होती.  तिचेवरून दुडदुड धांवत येतांना हें लहान मूल पाय घसरून कोलमडून पडलें.  त्या वेळीं मी जवळच एका खांबाला टेकून खालीं मान घालून दुःखीकष्टी बसलों होतों.  मी चटकन् उठून तिला कवटाळून उचललें व जेथें सर्व मंडळी बसली होती त्या कट्टयावर नेऊन ठेविलें.  हा देखावा पाहून मंडळींत हंशा पिकला.  लग्नांत माझी बायको ६।७ महिन्यांची होती म्हणतात.  तिची मानही नीट राहात नव्हती.  लग्नांत बायको लपवून ठेवितात.  तिला नवर्‍यानें शोधून कडेवर घेऊन यावयाचें वगैरे खेळ असतात.  माझ्या लग्नांत हा खेळ होणें शक्य नव्हतें.  तो खेळ मीं आज केला, म्हणून मंडळी हंसत माझी थट्टा करूं लागलीं.  मी स्वभावानें लाजाळू, घुमा व मंडळींत फारसा न मिसळणारा होतों.  तरी प्रसंग पडल्यास उचित असेल ती गोष्ट करण्यास किंवा बोलण्यास मी कधीं कसली फाजील लाज अगर भीड राखीव नसें.  माझी बायको अद्यापि फार लहान असल्यामुळें तिला तर लाज कशी ती माहीतच नव्हती.  ती माझी आतेबहीणच असल्यानें मीं तरी काय म्हणून लाजावें ?  तो गोड देखावा पाहून माझ्या भावाच्या मृत्यूनें ज्यांचीं हृदयें दग्ध झालीं होतीं त्या माझ्या आईबापांच्या तोंडांवर हंसें विलसूं लागलें.  माझ्या आत्येला तरी माझें इतकें कौतुक वाटलें कीं, त्याचें शब्दांनीं वर्णन करणें शक्य नाहीं.  आपल्या मुलीचें पालन आपला लाडका भाचा ऊर्फ जांवई पुढें उत्तम रीतीनें करील ह्याचें पूर्वचिन्हच ह्या प्रसंगीं प्रत्यक्ष पाहिल्याचा तिला आनंद झाला !  त्या वेळचें माझ्या बायकोचें गुटगुटीत बाळसें, कुरळ्या केसांच्या झिपर्‍या, सहजमधुर चेहरा, अंकुठित धांवपळ आणि पडली असली तरी मीं उचलल्याबरोबर तिनें दाखवलेलें बाळहांसें ह्या सर्वांची छबी माझ्या बाल-हृदयाच्या कॅमेर्‍यांत तात्काळ ठसवली.  ती निगेटिव्ह मीं अजून राखून ठेविली आहे.  कितीदां तरी एकटा असतांना मी ती काढून पाहात माझ्याशींच रमतों !  प्रिन्सिपाल गोळे ह्यांनीं आपल्या ''हिंदु धर्म आणि सुधारणा'' ह्या पुस्तकांत बालविवाहाच्या सात्त्विक प्रेमाचें जें गौरव गाइलें आहे, त्यांतलें रहस्य हेंच असेल काय ?  

मित्रमंडळ :  दुसर्‍या इयत्तेंत गेल्याबरोबर माझ्या अभ्यासाची प्रगति झपाट्यानें कशी झाली व मी एकदां वर्गांत जो पहिला नंबर पटकाविला तो शेवटीं सातव्या इयत्तेपर्यंत माझ्या शाळेंतील मुलांमध्यें अखेरपर्यंत कायम राखिला.  वर्गांत पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला मित्रांची, निदान सोबत्यांची उणीव कधीं भासणें शक्यच नसते.  ह्या न्यायानें माझेभोंवती सोबत्यांचा घोळका जमूं लागला.  पहिले गडी ब्राह्मणेतरच होते.  चंदू साळुंखे, लक्ष्मण जाधव हे दोघे मराठे, मलकाप्पा तुंगळ हा लिंगायत, पांडु हा न्हावी आणि मियासाहेब अथणी हा तर मुसलमान होता.  मी जसजसा वरच्या इयत्तेंत जाऊं लागलों तसतशी ही ब्राह्मणेतर मित्रमंडळी मागें गळूं लागली.  तिसर्‍या-चौथ्या इयत्तेपासून माझ्या प्रभावळींत बहुतेक ब्राह्मण मुलेंच दिसूं लागलीं.

मुक्तद्वार वाडा :  आमचा वाडा एकीकडे निवांत होता.  अभ्यासाला बसावयाला पुष्कळ जागा होती.  माझा पुस्तकांचा सांठा भरपूर.  कांहीं अडलेंनडलें तर सांगावयाला माझी नेहमीं तयारी.  माझा कोणताही सोबती असो, त्यावर पोटच्या मुलाप्रमाणें अकृत्रिम प्रेम करण्याची माझ्या आईबापांचीही तयारी. शिवाय आमच्या वाड्यांपुढें विस्तीर्ण अंगण आणि वाडा गांवाच्या हद्दीवर असून जवळच डोंगर आणि दरींतून एक सुंदर आंबराई.  इतकीं साधनें असल्यावर माझेभोंवतीं सोबत्यांची अष्टौप्रहर मांदी जमत असे ह्यांत काय नवल !  अभ्यास करीत करीत खेळ आणि खेळ खेळतच अभ्यास हा खेडवळ विद्यार्थ्यांचा निसर्गानेंच रेखून दिलेला कार्यक्रम असे.  तिसर्‍या इयत्तेपासून सातवीअखेर पांच वर्षेपर्यंत आमचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार विद्यार्थिवसतिगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना होता म्हणावयाचा !

नवीन भरणा :  तिसर्‍या-चौथ्या इयत्तेंत राम रानडे, सखाराम गोखले, वामन घारे, भिमू निवर्गी, मलकाप्पा तुंगळ इत्यादि मंडळी नेहमीं माझे खोलींत पडलेली दिसते.  पांचव्या-सहाव्या इयत्तेपासून ह्या मंडळांत नवीनच भरणा झाला.  जमखंडीचे पश्चिमेस मुधाळ संस्थान १२ मैलांवर आहे.  तेथील इंग्रजी शाळेंत त्या वेळीं चौथीपर्यंत इयत्ता होत्या.  म्हणून तेथून विष्णु देशपांडे, हणमंत कुळकर्णी, रामू पाटील व अंतू हनगंडी वगैरे मंडळी जमखंडीच्या शाळेंत शिकावयास आली. थोड्यांच दिवसांत हे सारे ग्रह माझ्याच मालिकेंत फिरूं लागले.  ही सर्व खेड्यांतील देशस्थ ब्राह्मणांचीं मुलें होतीं.  त्यांच्या आईबापांनीं एका घरीं त्यांच्या जेवणा-राहाण्याची सोय करून दिली होती.  ते सर्व आपसांत जवळचे नातलग होते.  थोड्यांच दिवसांत तीं सर्व माझ्या भावंडांप्रमाणेंच माझ्या घरीं पडून राहूं लागलीं.  इतकेंच नव्हे तर सुटीचे दिवसांत त्यांनीं मला आपल्या गांवीं न्यावें.  त्यामुळें त्यांच्या घराण्यांचा व माझ्या घराण्याचाही मोठा घरोबा जमला !  मुलांकडून वडिलांचा स्नेह जमणें म्हणजे वळचणीचें पाणी आढ्याला चढण्याप्रमाणेंच हा प्रकार होता.  सातव्या इयत्तेंत कुंदगोळाहून जनार्दन सखाराम करंदीकर हे आमच्या शाळेंत आले.  स्कॉलर ह्या नात्यानें हे माझे प्रतिस्पर्धी होते.  पुढेंही ते व मी कॉलेजमध्यें बी.ए.पर्यंत बरोबर शिकत होतों.

माझे बाबा

[ जन्म ( अदमासें ) १८३५ : मृत्यु २७ जून १९१० ]

आजे बसवंतराव यांना दोनच अपत्यें. वडील मुलगा माझे बाबा रामजीबाबा आणि धाकटी बहीण, माझी आत्या (आम्ही तिला अक्का म्हणत असूं) अंबाबाई. माझ्या बाबांचें रूप व स्वभाव बहुतेक माझ्या आजीचे वळणावर गेलें होतें. शेतकर्‍याचें पोर. निसर्गाचे मांडीवरच खेळून वाढलेलें. लहानपणीं ते खोडकर होते. तथापि पुढें कोणा एका शास्त्रीबुवांच्या जवळ ते लिहावयाला व हिशेब ठेवायला त्या वेळच्या मानानें फारच उत्तम प्रकारें शिकले. ह्याचें श्रेय आजोबाला, बाबांच्या तैलबुध्दीला किंवा त्या शास्त्रीबुवांच्या चांगुलपणाला द्यावे हें ठरविण्याला आतां मार्ग नाहीं. कारकुनीं शिक्षणांत तर बाबांचा जमखंडींत नंबर पहिला होता ! त्यांचें मोडी अक्षर म्हणजे मोत्यांचे दाणे ! माझ्या वेळेला बाबा तर मुलांना कित्ते घालून देत. जमाखर्चांत जमखंडी दरबारांत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. मामुली शिक्षण संपल्यावर संस्थानांत बिद्री नांवाचा एक पेट्याचा गांव आहे तेथें त्यांना प्रथम शिक्षकाची नोकरी लागली. त्या वेळीं ब्राह्मणी संस्थानांत ह्या मराठ्याच्या मुलाला शिक्षकाची नोकरी मिळाली ही सामान्य गोष्ट नव्हती. ही शाळा सरकारीच असली पाहिजे. एरवीं हा खाऊनपिऊन सुखी अशा मराठ्याचा एकुलता एक लाडका मुलगा, खासगी शाळा काढावयाला जमखंडी हा राजधानीचा गांव सोडून बिद्रीसारख्या पेट्यांत कां गेला असता ? ह्या सर्व गोष्टींत त्या शास्त्रीबुवांचें कांही अंग आहे. त्या ब्राह्मणाचें लक्ष ओढून घेण्यासारखें कांहीं विशेष पाणी बाबांत असलें पाहिजे. हें पाणी आमच्या आजोबांकडून आलें असावें. तें मजमध्यें किती आलें, हें ठरविणें माझें काम नव्हें.

पांढरपेशी शिक्षण : नुसतें कारकुनी शिक्षणच नव्हे, तर धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र वगैरे सांस्कृतिक विषयांची तांत्रिक माहिती बाबांना बरीच होती, हें मला समजूं लागल्यापासून माझे नजरेस येऊं लागलें. त्यांना संस्कृत येत नव्हतें, तरी मराठींतील संस्कृत तत्सम शब्दांचे कठीण अथ त्यांना समजत असत. इतकें त्यांचें प्राकृत पोथ्यांचें वाचन झालें होतें. त्या काळच्या प्राकृत पौराणिक सर्व पोथ्यांचा व मूलस्तंभ पंचांगें वगैरे शास्त्रीय वाङ्‌मयाचाही संग्रह त्यांनीं चांगला केला होता. ह्यावरून त्यांची वाङ्‌मयभक्ति दिसते. माण्या लहानपणीं एक शास्त्री पुराण सांगावयाला आमचे घरीं नेहमीं येत. ह्यावरून गुणी माणसांची संभावना करून खानदानी लौकिक राखण्याची बाबांची प्रवृत्ति चांगली दिसते. त्यांचा हात सढळ होता. किंबहुना ते बेहिशेबी मराठा होते असें म्हटलें तरी चालेल. कारकुनी हिशेबांत ते कोणालाही हार न जाणारे असतां संसारांतील काटकसरींत ते फार मागासलेले होते हें मोठें आश्चर्य ! सर्व जातींतील संभावित माणसांचा त्यांना स्नेह व लळा होता. पण ब्राह्मणी बहुश्रुत राहणीचेंच वळण त्यांना जास्त कां लागलें ह्याचें कारण त्यांचे गुरुजी शास्त्रीबावाच असावेत. पण ह्या बाबतींत मला निश्चित असें कांहींच सांगतां येत नाहीं. इतिहास-शोधनाची आवड उत्पन्न होण्यापूर्वीच माझ्या घराण्यांतील सर्व वडील माणसांचा, वस्तूंचा, मौल्यवान् कागदपत्रांचा व दप्‍तराचा नाश व्हावा ही मला आतां मोठी खेदाची गोष्ट वाटते ! इतिहास हा माझा कॉलेजांतील आवडीचा विषय असून असें कां झालें याचें कारण माझी फकिरी वृत्ति.

ब्राह्मणी वळण : बैठ्या शिक्षणाचें ब्राह्मणी वळण बाबांच्या अंगांत इतके भिनलें कीं, अजोबांचा शेतकीचा अगर शिलेदारीचा बाणा त्यांच्यांत मुळींच उरला नाहीं. फार काय पण त्यांच्या पोषाखांतही ब्राह्मणी झांक दिसे. माझ्या आजोबांची पांढरी बिन-पिळाची बत्ती किंवा पायांतली फार तंग नसलेली पण रुबाबदार विजार मीं बाबांचे अंगांत कधींच पाहिली नाहीं. इतकेंच नव्हे तर ब्राह्मणाप्रमाणें ते दहा हात लांब धोतर नेसत असत व तें थोडें जुनें झालें म्हणजे, तेंच दुमडून पांघरण्याचें उपरणें करीत.

ही चाल जमखंडीस सभ्य ब्राह्मणमंडळींत अद्यापि असावी. आमचे इंग्रजी शाळेचे हेडमास्तर त्रिंबकराव खांडेकरही असेंच जोडउपरणें पांघरीत. बाबांचा अंगरखा मात्र मराठा बाण्याचा असे. तो गुडघ्याच्या खालपर्यंत घोळदार असून छातीवर बंद असत. अस्तन्यांवर बर्‍याच चुण्या असून शेवटीं त्यांना कान असत. ते मणगटाच्यापुढें हाताच्या पंजावर अगदीं बोटांपर्यंत पसरलेले असत. रुमाल कनार्टकी तऱ्हेचा मोठा असून तो बांधण्याची ढब ठरलेली असे. पायांत जोडाही मराठी तऱ्हेचा असे. एकंदर पोशाख शुभ्र आणि साधा असून रुबाबदार असे. ॠतुमानाप्रमाणें ह्यांत कधीं फरक होत नसे. अर्ध्याच पोषाखानें ते कधीं बाहेर पडत नसत.

कडक स्वभाव : बाबांचा स्वभाव फार बोलका होता. ते आपल्या मित्राजवळ बोलत बसले म्हणजे मला लहानपणीं ऐकण्याची फार मौज वाटे. त्यांच्या बोलण्यांत म्हणी फार असत. मराठी, कानडी व मुसलमानी ते सफाईनें बोलत. ऐकणार्‍यावर त्यांची छाप तेव्हांच बसे. ते स्वभावानें किंचित् शीघ्रकोपी, पण खुल्या दिलाचे व मृदु अंतःकरणाचे असत. आम्हांला ते लहानपणीं रागानें एकदां मारीत सुटले म्हणजे बेतालपणानें फारच मारीत व मग राग ओसरल्यावर आपणच अश्रु ढाळीत. बिद्रीचे शाळेंत असतांना ते मुलांना फार मारीत, म्हणून त्यांना त्या नोकरीवरून श्रीमंतांनी आपल्या खासगींत जवळ घेतलें, असें मी एकदां ऐकलेलें स्मरतें. ते विशेषतः माझ्या मोठ्या भावाला फार मारीत. त्यांना आम्ही लहानमोठे सर्वजण फारच भीत असूं. इतकेंच नव्हे तर गांवांतही त्यांची जरब फार असे. गांवच्या पोलीस शिपायांनीं एखादी कांहीं चूक केली तर आपल्या पोटच्या पोराप्रमाणेंच बाबांनीं त्यांना कित्येक वेळां मारलेलीं उदाहरणें घडलीं आहेत ! व्यवहारांत मात्र ते फार भोळसट असत. कांहीं विक्री-सौदा करावयास ते गेले तर व्यापार्‍यांच्या डोईवर देवाचा प्रसार ठेवून त्यांना धमकावून खरी किंमत सांगावयास लावीत. मग त्यांनीं सांगितलेलीच किंमत ते देत ! पण त्यांनीं बिनव्याजी दिलेलें कर्जही कधीं कोणीं परत फेडलेलें मला आठवत नाहीं. फार काय, पण श्रीमंतांशीं भांडून सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हां ते घरीं बसले, तेव्हां त्यांनीं कांहीं प्रकरणीं स्वतःची तसलमात २५८९ रुपये (पंचवीसशें एकूणनव्वद) सरकारांत खर्ची घातले होते. तेही त्यांनीं १५।१६ वर्षे मागितले नाहींत. पुढें आमच्या घरीं आम्ही दारिद्य्राच्या भयंकर यातना सोशीत असतांना ही तसलमात परत मागण्याच्या याद्या कितीदां तरी श्रीमंत आप्पासाहेबांकडे केलेल्या मीं पाहिल्या; पण एक कवडीही परत मिळाली नाहीं.

तरुणपणीं बाबांच्या हातांत चार पैसे खेळत, म्हणून त्यांनीं प्रथम प्रथम ऐष-आराम केला. पण त्यांच्या धर्माकडे स्वाभाविक असलेला ओढा बळावला. विशेषतः पंढरपूरच्या वारकारी पंथाचा त्यांना फारच नाद लागला. प्रथमपासून त्यांचा स्वभाव प्रेमळ, श्रध्दाळू, उदार आणि करारी असे. त्यांच्या प्रामाणिकपणाचा किंबहुना सर्वच आमच्या घराण्याच्या प्रामाणिकपणाचा लौकिक जमखंडी संस्थानांत गाजत होता.

बाबांची रसवंती : मी अगदीं लहान असतांना बाबांच्या मित्रांपैकीं म्हातारबा सुतार, बसाप्पा अथणी (लिंगायत) आणि बापू जामदार (मराठे) हे वरचेवर घरीं येत. नंतर मी थोडा मोठा झाल्यावर सटवप्पा सुतार आणि पांडाप्पा टर्की (ब्राह्मण वारकरी) हे येत असत. पण बाबा कांहीं फारसे कोणाचे घरीं जात नसत. आमच्या वाड्यांत सोप्याच्या उजव्या बाजूस एक चारपांच फूट लांबरुंद, स्वच्छ व प्रशव्स्त चुनेगच्ची कट्टा असे. ह्याला आम्ही तुळशीकट्टा म्हणत असूं. कारण पूर्वी तेथें तुळशीवृंदावन होतें. ह्या कट्टयावर बाबा आपल्या मित्रांशीं बोलत बसत. मी आपला तेथें घुटमळत असावयाचा. कारण बाबांचें संभाषण मला आवडत असे. मला वाटतें माझे अंगीं जर कांहीं वक्तृत्व आलें असेल तर त्याचें प्रथम बीजारोपण बाबांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीनें केलें असावे. रूपानें, रंगानें व स्वभावानें मी अगदीं बाबांचे वळणावरचा आहें, असें मला लोक म्हणत असत.

जमखंडीस पंढरपूरचा भजनी संप्रदाय वाढविण्याच्या कामी बाबांचा पुढाकार होता. बसप्पा नांवाचे एक रजपूत गृहस्थ फार सात्त्विक होते. मीं त्यांना कधीं पाहिलें नाहीं. ते जमखंडीस हा पंथ काढण्यांत मुख्य होते, असें मीं ऐकलें होतें.

विठोबाचा सप्ताह : आमचे घराजवळ 'आप्पासाहेबांची विहीर' म्हणून एक पिण्याच्या पाण्याची मोठी विस्तीर्ण व खोल विहीर आहे. तिचे कांठीं सटवाप्पा सुताराचें घर व सुतारीचा कारखाना आहे आणि त्याचे समोर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूस विठाबाचा मठ आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेपासून (ही श्रीतुकारामबोवांची पुण्यतिथि) तों पुढच्या षष्ठीअखेर (ही श्रीएकनाथस्वामींची पुण्यतिथि) पांच दिवस आणि त्यापूर्वी व नंतरचे दोन दिवस असा दरवर्षी त्या मठांत भजनाचा मोठा सप्ताह साजरा केला जात असे. सात दिवस वीणा रात्रंदिवस खालीं ठेवायचाच नसतो. दररोज काकडआरती, शेजारती सकाळसंध्याळ होई. त्या वेळीं मोठी गर्दी जमे. ३०।४० नियमित टाळकरी लंबगोलांत उभे राहात. मध्यें वीणेकरी उभे राहात. दोहों बाजूंस या गोलाचे शेवटीं दोन मृदुंग्ये उभे असत. आरतीचे वेळीं भजनाच्या सोहळ्याला फार रंग येई. बीजेच्या व षष्ठीच्या आरतीचा थाट मोठा होई. कुरमुरे, नारळ व बत्तासे ह्यांनीं भरलेलीं खिरापतीचीं ताटें ऐकणारे स्त्रीपुरुष आणीत. आरतीचे वेळीं गुलाल उधळला जाई. बुक्का, उदकाड्या, कापूर यांचा घमघमाट सुटे. टाळकर्‍यांत मुलें उभी राहात. त्यांत मी व माझा मोठा भाऊही असूं. वीणेकरी हरीबा कर्जगार नांवाचे जिनगर (वारकरी) असत. आरती धरण्याचा मान बाबांचा असे. तो देखावा माझ्या डोळ्यांपुढें चित्रासारखा आहे. माझ्या धार्मिक विकासांत या भजनाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आरती संपल्यावर सायंकाळीं ६ वाजतां प्रसाद म्हणजे जेवणाच्या पंक्ति बसत. शंभर-दोनशें पात्रें तरी दररोज होत. त्यांत वाणी, मराठी, ब्राह्मण, सुतार, सोनार, जिनगर, शिंपी वगैरे जाति असत. जातिभेदाचे नियम कडक पाळण्यांत येत नसत. शेवटचे दिवशीं मोठी आरती व महाप्रसाद होऊन रात्रीं १० वाजतां दिंडीचा छबिना निघे. तो सर्व रात्रभर गांवांतून व पेठेंतून ब्राह्मणआळींत एक जुनें विठोबाचें देऊळ आहे, तेथें जाऊन सकाळीं ८।९ वाजतां परत मठांत येई.

बबलादीचे स्वामी : बाबांची मानमान्यता सर्व जातींत असे. त्यामुळें आमचे घरीं जातिभेद विशेषतः पाळण्यांत येत नसे. बाबा मराठे जातीचे सरपंच असूनही आमचे घरीं जातिभेदाची इतकी ढिलाई होती. फार काय पण ब्राह्मण लिंगायतसुध्दां आमचेकडे येऊन जेवत. मात्र तें फार उघडपणें नसे. इतकेंच नव्हे तर पुढेंपुढें बबलादीच्या लिंगायत स्वामींचे आमचेकडे येणें-जाणे फार झालें. तेव्हां तर उघडपणें आमच्या घरीं सर्व जातींच्या पंक्ति बसत. त्या वेळीं मी इंग्रजी ५।६ इयत्तेंत होतों. ह्या स्वामींच्यापुढें एक शिंग वाजविणारा महार असे. तोही आमचेकडे जेवत असे. बबलादीचे स्वामी एक प्रसिद्ध सिद्ध गणले जात. हे उघडपणें दारू पीत व मांसही खात. धर्माच्या नांवावर हें सगळेंच उघड चालत असे. आमचें अठरा विश्वे दारिद्र्य असूनही ही टोळधाम आमचे घरीं आठ-आठ दिवस उतरत असे. खर्च कसा चाले ह्याचें मला आश्चर्य वाटतें. त्या वेळीं मला नुसती मौज वाटत असे. पुढें मॅट्रिकची परीक्षा होऊन मी पुण्यास कॉलेजांत शिकुं लागलों, तेव्हां माझें वजन घरी भासूं लागलें. प्रत्यक्ष बाबाही मला पाहून दबत असत. पुढें या स्वामीमंडळाचें प्रस्थ कमी होऊन नंतर त्यांचें येणें अजिबात बंद झालें.

तुळजापूरची अंबाबाई, सौदत्तीची यल्लमा, पंढरपूरचा विठोबा, नरसोबाचे वाडीचा दत्तात्रय, कोल्हापूरची महालक्ष्मी ह्या मोठमोठ्या क्षेत्रांतल्या प्रसिद्ध दैवतांचे संप्रदाय तर असतच, पण शिवाय वरील बबलादीचे स्वामी, रामदासी पंथ, गोसावी-बैरागी, अतिथि-अभ्यागत वगैरे अनेक खुळांचा सुळसुळाट आमचे घरीं सारखा चाललेला असे. मिळकत मुळींच नाहीं, उलट खर्चालाही ताळ नाहीं. ह्याचा परिणाम ठरलेला झाला. तो हाच कीं, शेतें गेलीं, गुरें गेलीं, घर गेलें, दागिने गेले. सर्व सावकाराचे हातीं गेलें आणि एक दिवशीं पांघरलेल्या कपड्यानिशीं आम्ही आमच्या मोठ्या वडिलोपार्जित वाड्यांतून बाहेर पडलों व भाड्याच्या घरांत जाऊन राहिलों. त्या वेळेला मला चांगलें कळत होतें. माझी मॅट्रिकची परीक्षा होऊन मी पुण्यास शिकत असेन. या सर्व करुण रसानें भरलेल्या नाटकांत मुख्य नायिकेचें पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय. आतां तिच्या आठवणीस सुरुवात करतों.

माझे खेळ

जमखंडी गांव हा खेडेवजा.  इंग्रजी शाळा नुकतीच झालेली.  तेथें अलीकडच्या हायस्कुलांप्रमाणें क्रीडांगणें, व्यायामाचे प्रकार, ड्रिलमास्तर हे काठून असणार ?  आम्ही कोठें तरी गांवाबाहेर जाऊन खेळत असूं.

सोंगट्यांचा खेळ  :  माझा वडील भाऊ असतांना आमच्या घरीं बैठा खेळ म्हणजे सोंगट्यांचा.  गंजिफा, बुद्धिबळें, सोंगट्यांचे हस्तिदंती फांसे वगैरे खेळांचीं सर्व साधनें आमच्या बाबांनीं घरीं करून ठेविलीं होतीं; पण त्यांना कधीं खेळतांना आम्हीं पाहिलें नाहीं.  हें सामान मात्र घरीं भरपूर होतें.  हा एक बाबांच्या रसिकपणाचा मासलाच म्हणावयाचा.  दिवाळीच्या सणांत आमच्या घरीं सोंगट्यांची मजलसच भरें.  नरकचतुर्दशीच्या आदले रात्रीपासून तों भाऊबिजेची रात्र उजाडेपर्यंत कवड्यांचा खळखळाट अष्टौप्रहर चालत असे.  हा खेळ मोठ्या इरेचा.  मनुष्य कितीही शांत असला तरी तो चिडून भांडल्याशिवाय ह्या खेळाची समाप्‍ति म्हणून व्हावयाची नाहीं.  एका एका बाजूला दहा-दहा बारा-बारा गडी बसलेले.  संध्याकाळीं खेळ सुरू होऊन उजाडेपर्यंत आम्ही त्यांत गढून जात असूं.  भांडण केव्हां केव्हां हातघाईवरही यावयाचें.

एक मल्लयुद्ध  :  माझा स्वभाव विशेष तापट असे.  एकदां अलगूरचे आमचे मामा (हे वयानें माझ्या वडील भावाहून फर तर १।२ वर्षांनीं मोठे असतील) एकीकडे आणि मी व माझा भाऊ एकीकडे असे सोंगट्या खेळत होतों.  मामा फार विनोदी, रडी खेळणारे, चिडखोरांना अधिक चिडवून मजा बघणारे.  खेळ बाजूस राहून आमचें भांडण जुंपलें.  शब्दयुद्ध संपून मल्लयुद्ध सुरू झालें.  मामा म्हणजे पट्टीचा पहिलवान !  आम्ही दोघेच काय, पण दहा असलों तरी ते कसची दाद देतात !  दुसर्‍याला चिडवून ते स्वतः कधींच चिडत नसत.  शेवटीं प्रकरण अगदीं निकरावर जाऊन स्वयंपाकघरांतून आईला आमचेकडे यावें लागलें.  गलिव्हरच्या अंगावरील लिलिपुटांप्रमाणें आम्ही दोघे बंधु मामांच्या पाठीवर चढून लाथांचा व बुक्क्यांचा मारा चालविला होता.  मामा खालीं तसाच वांकून हांसून आम्हांला अधिकच खिजवीत होते.  हा प्रकार पाहून आई म्हणाली, ''अरे, हा कसला नवीनच डाव आज काढला आहे रे !''  तीही आपल्या भावाचें पाठबळ न घेतां आमचीच बाजू घेऊन मामांना म्हणाली, ''तूं मोठा असून तुला लहान मुलांशीं असले प्रसंग करायला कळत नाहीं काय ?''  खरें पाहतां चूक आम्हांकडेच असावयाची.  पुढें मी हायस्कुलांत गेल्यावर अगदीं मॅट्रिक होईपर्यंत आमचे घरीं ह्या खेळाचा अड्डा जमत असे.

पटाईत वृत्ति  :  दिपवाळी आली कीं माझ्या अभ्यासाच्या खोलीला चुना, रंग वगैरे मी स्वतः व माझे सोबती लावीत असूं.  वर छात, झालर आणि रोषणाई आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणें करीत असूं,  दुसर्‍यांच्या घरींही असे अड्डे होत, तेव्हां अरसपरस जावें यावें लागे.  रात्रीं किती भांडणें झालीं, बोलाचाली केली, तरी उजाडल्यावर रात्रीचा प्रकार जणुं काय स्वप्नांत झाल्याप्रमाणें आम्ही सर्व विसरून जात असूं !  सहाव्या-सातव्या इयत्तेंत असतांना तेरदाळचे विष्णु देशपांडे, रामू पाटील, अंतू हनगंडी, मळलीचे हणमंत कुलकर्णी, त्याचा भाऊ रामू, जमखंडीचे भिमू निवर्गी, व्यंकू कुलकर्णी, सिनू करकंबकर, रामू जासूद वगैरे १५।२० जण ह्या खेळांत जमत असत.  मी व तेरदाळचे देशपांडे नेहमीं विरुद्ध पक्षाला असूं.  दोघेही सारखेच चिडखोर आणि हेकेखोर.  खेळापेक्षां भांडणांतच वेळ आणि शक्ति यांचा जास्त खर्च.  शेवटीं शेवटीं जुळवून कवड्यां टाकण्याची पद्धत निघाली.  व्यंकू कुलकर्णी म्हणजे प्रत्यक्ष शकुनीमामाच.  कवड्यां जुळवून वाटेल तो फांसा हमखास टाकण्यांत त्याचा हातखंडा.  त्याच्या खालोखाल मीही जुळवण्यास शिकलों.  दहा, पंचवीस, सहा, बाराच काय, पण साधे तीन आणि चार हेही आम्ही जुळवून नेमके पाडीत असूं.  केव्हां केव्हां बाहेरचे लोक डाव पाहावयाला बसत असत.  रंग बहारीचा चढे.  पत्ते, गंजीफा आम्ही क्वचित् खेळत असूं.  बुद्धिबळाला तर हातच लागत नसे.  तो गर्दीचा खेळ नव्हे.  तितकी गंभीरताही आमच्यांत नव्हती.

'किर्र' खेळ :  आट्यापाट्या, हुतूतू, खोखो वगैरे मैदानी खेळ आम्ही खेळत असूं.  शिवाय किर्र म्हणून एक खेळ विशेष चुरशीचा असे.  यांत हारलेल्या बाजूचे गडी एकामागें एक कंबरेला धरून वांकून उभे राहात आणि विजयी बाजूचे गडी लांवून धांवत येऊन त्यांच्यावर स्वार होत.  ते बराच वेळ बसले आणि भार सहन होईनासा झाला, म्हणजे खालच्यापैकीं कोणी तरी 'किर्र' म्हटलें कीं खालीं उतरून पुन्हां उडी घेत.  पण जर का वर बसलेल्यांपैकीं एकाचा जमिनीला पाय लागला कीं, त्याच्यावर डाव येऊन त्याच्या पक्षाला खालीं वाकावें लागे.  ब्राह्मणांचीं मुलें हा खेळ खेळावयाला कचरत असत.

सूरपारंब्या  :  झाडावरचा सूर हा खेळ फार मौजेचा वाटे.  जमखंडी गांवाभोंवतीं डोंगराच्या दरींतून व तळ्यांच्या कांठीं बर्‍याच रम्य आंबराया असत.  येथें सायंकाळच्या वेळीं निवांत असे.  आमची वानरसेना हा खेळ खेळावयास एखादें विस्तीर्ण शाळेचें ठेंगणें आंब्याचें झाड गांठीत असे.  सर्वांनीं झाडावर चढावयाचें.  एकानें खालीं उतरून, एक दांडकें आपल्या उजव्या तंगडीखालून दूर फेंकावयाचें.  ज्याच्यावर डाव आलेला असे तो तें आणीपर्यंत टाकणारा झाडावर चढे.  तें दांडकें ठरलेल्या कोंडाळ्यांत ठेवून डाव आलेला गडी झाडावरच्यांना शिवण्याचा प्रयत्‍न करी.  त्याची नजर चुकवून कोणी तरी दांडक्यावर नेमकी उडी टाकून तें दांडकें पुन्हां पूर्वीप्रमाणें फेकून तो झाडावर चढे.  कोणी तरी एकाला शिवेपर्यंत त्याच्यावरचा डाव जात नसे.  हा खेळ मुख्यतः गुराखी मुलांचा असे.  ह्याला वडाचें झाड चांगलें.  त्याच्या फांद्या लांबवर गेलेल्या असतात व लाकूड चिवट असल्यानें मोडण्याची भीति नसते.  आंब्याचें झाड पोकळ असतें.  शिवाय आंब्याच्या मोसमांत आंबराईंत राखण बसे.  वडाला नेहमीं मुक्तद्वार.  शिवाय पारंब्या खालीं लोंबत असल्यामुळें त्या धरून खालीं उड्यां घेण्यास किंवा खालूनच उलटें झाडावर चढण्यास हेंच झाड फार सोयीचें.  मात्र घरीं येईपर्यंत अंगावरचे कपडेच काय, पण कातडेंही जागजागीं फाटलेलें असल्यामुळें घरच्या मंडळींपासून फाटका आणि ओरखडलेला भाग लपवून ठेवण्याचा दुसरा एक खेळच खेळावा लागत असे.  हातपाय मुरगळलेला, डोकीला खोंक पडलेली, पाठ खरचटलेली, शिरा ताणलेल्या व हाडेंन् हाडें खिळखिळीं झालेलीं, अशा स्थितींत घरीं आलेल्या गड्यांला पुन्हां एक आठवडा तरी आंबराईकडे जाण्याची इच्छा होते कशाला !  पण दुसर्‍या आठवड्यांत पुन्हां हीं माकडें झाडावर आहेतच तयार !  जित्याची खोड मरेतोंपर्यंत जात नाहीं; पण आमची खोड मॅट्रिक झाल्यावर पार गेली.  कॉलेजांत जाणें म्हणजे बालपणालाच नव्हे तर जन्मभूमीलाही मुकणें होय !

सूरपाट्या :  सूरपाट्या हा एक अगदीं राजमान्य राष्ट्रीय खेळ.  तो आम्हां खेडवळांचा क्रिकेटच.  जमखंडीच्या पूर्वेस नंदिकेश्वराचें एक जुनें देऊळ आहे आणि वायव्येस सुमारें एक मैलावर अबूबकरांचा दर्गा आहे.  ह्या दोन ठिकाणच्या प्रशस्त पटांगणांत आमची टोळी सूरपाट्या खेळण्यास जात असे.  एकदां जाण्याची घडी पडली म्हणजे तीन तीन महिने ती मोडत नसे.  त्या अंगणांत खेळून खेळून पाटीचे आडवे आणि सुराचा एक लांब उभा असे खाचरच पडत.  ह्या दोन जागा म्हणजे आमच्या वतनाच्या झाल्या होत्या.  तेथें दुसरें कोणीं फिरकावयाचें नाहीं.  इंग्लंडमध्यें ज्याप्रमाणें ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा वचक व दबदबा असतो, तसें जमखंडीस आम्हां विद्यार्थ्यांच्या कळपाचें वजन असे.  ह्या टोळीचा मी नायक म्हणून प्रसिद्ध असे.  गांवचे लोक-विशेषतः आमची शिक्षकमंडळी-आमच्या खेळाचें कौतुक करीत असत.  एकदां जमखंडीचे आम्हां विद्यार्थ्यांच्या कळपाचें वजन असे.  ह्या टोळीचा मी नायक म्हणून प्रसिद्ध असे.  गांवचे लोक-विशेषतः आमची शिक्षकमंडळी-आमच्या खेळाचें कौतुक करीत असत.  एकदां जमखंडीचे वृद्ध यजमान श्रीमंत अप्पासाहेब यांनीं उन्हाळ्यांत साखरपाणी करून मोठ्या आवडीनें आम्हां विद्यार्थ्यांना साखरपाण्याचे पेले पाजले !

आमचा कंपू  :  आमचा कंपू घेऊन मी दरसाल उन्हाळ्यांत आणि पावसाळ्यांत कोठें तरी नदीच्या कांठीं किंवा डोंगराच्या दरींत वनमोजनाला जात असें.  आमच्यांत लिंगायत, मराठे, ब्राह्मण, मुसलमान वगैरे सर्व जातींचे विद्यार्थी असत.  जातिभेद कसला तो आमच्या गांवींही नव्हता.  तसलीं सोंवळीं पोरें आमच्या वार्‍यालाही उभीं राहात नसत आणि आम्ही त्यांना आमच्यांत घेतही नसूं.  जनुभाऊ करंदीकर असल्या सोंवळ्याचा होता.  तो आमच्यांत फारसा मिसळत नसे.  आमचा सर्व कंपू नेहमीं आमच्या वाड्यांत रात्रंदिवस पडलेला असे.  बाहेरच्या मोठ्या अंगणापासून आंत स्वयंपाकघरापर्यंत व देवघरापर्यंत ह्या टोळ्यांचा धुडकूस चाले. बाबांना मात्र सर्व भीत.  त्यांचेसमोर आम्ही पुस्तकांत नाक खुपसून बसत असूं.  ते बाहेर गेले कीं घेतलाच सर्व वाडा डोक्यावर.  माझ्या दोन बहिणी जनाक्का व तान्याक्का ह्या लहान, अल्लड असत.  त्याही आमच्या धांगडधिंग्यात सामील होत.  माझ्या आईला कोणीच भीत नसत.  तिला सर्व आपलींच पिलें वाटत.  तिला स्वतःस वीस झालीं.  हीं बाहेरचीं वीस !  कित्येक वेळां स्वयंपाकघरांतील खाण्याच्या पदार्थांवर हल्ला होई.  आमच्या गरिबींतले शिळे तुकडे तेरदाळचा विष्णु आणि जमखंडीचा सीनु हीं श्रीमंतांची मुलें मिटक्या मारीत खात.  मग आईला मायेचें भरतें कां येऊं नये ?  हे माझ्या भावी सामाजिक सुधारणेचे पाळण्यांतले पाय बरें !  भावी चारित्र्याचे नमुने पुस्तकांतील रेखीव धड्यांत अगर वर्गांतल्या निर्जीव बाकावर बनत नसून, ते अंगणांतल्या जिवंत धांगडधिंग्यांत आणि समानशील सवंगड्यांच्या धसमस्करीच्या जिव्हाळ्यांत जन्म पावत असतात.

चित्रकला  :  आमचा सर्व वेळ अभ्यासांत किंवा खेळांतच जाई, असें नव्हे.  नित्य कांहीं तरी नवीन कल्पना निघे आणि आम्ही सर्वच त्यांत रमत असूं.  चित्र काढण्यांत आमच्यांतला रामू रानडे याचा हात चांगला चाले.  आमच्या टोळीला लागला चित्रें काढण्याचा नाद !  आमच्या सोप्यांत आणि तुळशीकट्टयावरच्या भिंतीवर चमकावयाला लागलीं रामाचीं, मारुतीचीं, देवदेवींचीं चित्रें.  तुळशीकट्टयावरची भिंत चुन्याची होती.  तिचेवर मीं लाईफ साईझ रामपंचायतन रंगीत काढलें होतें.  तें बरींच वर्षे राहिलें होतें.  घरांत आलेल्यांना तें दर्शनी भागीं असल्यामुळें दिसे.  आतां आठवल्यावर मला त्याची लाज वाटते.  (कारण त्याच दर्जाची ती आमची कला होती !)  पण त्या वेळीं मला त्या चित्राचा पोरकट गर्व वाटत होता.  ह्यावरून मी लहानपणीं किंचित् बढाईखोर असेन, असें वाटतें.

कारागिरी  :  गणेशचतुर्थी आली आणि आमच्या टाळक्यानें घेतलें कीं, प्रत्येकानें गणपति स्वतः करावयाचा !  मग चाललें हें माकडमंडळ जमखंडीच्या पुर्वेस २-२॥ मैलांवर एक डोंगर आहे, तेथून शाडूची माती आणावयाला.  बरीच शाडू आणून जो तो चढाओढीनें गणपति करूं लागला.  'विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम' असाही प्रकार पुष्कळांचा झाला.  तरी प्रत्येकाला आपलीच कृति पसंत पडून प्रत्येकानें आपापली पाठ आपणच थोपटून घेतली.  खरें पाहातां रामू रानड्यांचा गणपति मात्र त्यांतल्या त्यांत गणपतीसारखा दिसत होता.  कांहीं असो.  त्या गणेशचतुर्थी सर्वांनीं स्वकृत गणपतीचीच पूजा केली, ही कांहीं थोडी गोष्ट नव्हे !

आमचे कारखाने  :  एकदां साबण करण्याची टूम निघाली.  जो तो चुना आणि तेल ह्यांत हात घालून बसला.  वड्यां तयार झाल्या, पण त्या वाळेचनात !  वाळल्या तर पुन्हां ओल्याच होईनात.  कपड्यांला लावूं गेलों तर कपडा फाटे, पण डाग कांहीं जाईना.  साबणाचे नवे डाग कपड्यांला पडूं लागले.  चहूंकडे छीःथू झाली आणि आमच्या पियर्स सोप कंपनीचें दिवाळें निघालें.  ह्याचप्रमाणें शिसपेन्सिली, दगडी पेना ह्यांचे आमचे कारखाने जसे निघाले तसेच बुडाले.  भागीदार आमचे आम्हीच असल्यानें कोण कोणावर फिर्याद करतो ?  केली तरी पुन्हां हसेंच होणार ना !  तरी एका गोष्टींत आमचा हातखंडा असे.  आमची शाई आम्हीच करीत असूं.  बाभळीच्या शेंगा शिजवून त्यांत हिरडा व हिराकस घालून आम्ही शाईच्या बाटल्या भरून ठेवीत असूं.  मग वाटेल तितक्या दौती लवंडल्या तरी भरलेल्या बाटल्या कोनाड्यांत शिल्लक असतच.  मात्र ह्या शाईच्या कारखान्याच्या भरभराटीमुळें, शाई वेळोवेळीं घरभर सांडे आणि त्यामुळें बिचार्‍या आमच्या आईला सारवणाचा नवीनच त्रास उद्‍भवे.  ह्या गालबोटामुळें आमच्या यशाची शुभ्रता जास्त उठावदार दिसूं लागली.  मग आईच्या त्रासाला कोण जुमानतो ?

  1. माझे आजोबा
  2. माझी आजी
  3. माझी आई
  4. माझा हायस्कूलचा काळ
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
Page 41 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी