1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

बिल्लवांची तक्रार

दहाजणांची तक्रार  :  साधु शिवप्रसाद आणि मी त्या प्रांतांतील निरनिराळ्या ब्राह्म समाजांची स्थिति पाहून व प्रचार करून आलों.  प्रत्येक ठिकाणीं अंतस्थ कलह आणि राजकारणाची अवास्तव धास्ती हीं लक्षणें सर्वसामान्य दिसत होतीं.  ज्यांनीं उठावें त्यांनीं नवीन समाज स्थापावा; पक्ष आणि तट वाढवावे; बाहेरून प्रचारक गेल्यास आपापली बाजू सांगून त्याचे कान भरवावेत.  या प्रकारामुळें प्रचारकांची फार ओढाताण होई.  कामांत मोठा अडथळा होत असे.  ता. १८ जून १९२४ रोजीं मी मंगलोर शहरीं परत आलों.  येईपर्यंत मंगलोर ब्राह्म समाजांत एक भयंकर वितुष्ट माजून राहिलें.  ब्राह्म समाजांतील १० बिल्लव जातीय पुढार्‍यांच्या सह्यांनीं मला रजिस्टर पोस्टानें पत्र आलें होतें.  तें मला २० जूनला पोंचलें.  सही करणार्‍यांची माझ्या उलट त्यांत अशी तक्रार होती कीं, (१) त्यांनीं पुष्कळ विनंती करूनही मी आपली गांधी टोपी घालावयाची सोडीत नाहीं.  (२) व्हायकोमच्या दौर्‍यावर असतांना कालिकत येथें व दक्षिण मलबारांत जाहीर सभांतून मीं राजकीय विषयांवर भाषणें करून राजकीय चळवळींत भाग घेतला.  (३) सही करणारे दहा गृहस्थ व इतरही कित्येक सभासद सरकारी नोकर आणि इतर युरोपियन कंपनीचे नोकर असल्यानें माझ्या राजकारणापासून त्यांना मोठा धोका पोंचणें संभवनीय आहे.  (४) म्हणून मी अतःपर राजकारणांत भाग घेणार नाहीं असा लेख माझ्या सहीनिशीं लिहून ज्या वृत्तपत्रांतून माझी राजकीय चळवळ प्रसिद्ध झाली होती त्यांतून लेख प्रसिद्ध करावा.  (५) असें लवकर न झाल्यास समाजाची जादा साधारण सभा बोलावून योग्य तो उपाय करावा लागेल.

मीं ताबडतोब उत्तर दिलें कीं, ''मी मंगलोर येथें परत आल्यावर खुलासा घेऊन मग ही तक्रार केली असती तर चाललें असतें.  दौर्‍यावर मीं जी चळवळ केली व भाषणें केलीं त्यांचा विषय राजकारण मुळींच नसून समाजसुधारणा व धर्मसुधारणा हाच होता.  अर्थात् मी राजकारणांत भाग घेणार नाहीं असें लिहून देण्यास मुळींच बांधलेला नाहीं.  तो माझा व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे.  समाजाच्या हिताला बाध न आणतां राजकारणाच्या मूल तत्त्वाबद्दल ऊहापोह करणें माझें पवित्र कर्तव्य आहे.  आतां तरी तक्रार करणार्‍यांनीं समक्ष भेटून तक्रार मिटवावी.  ज्या कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधि म्हणून मी येथें कार्य करीत आहें त्यांच्या सांगण्यावरूनच मी व्हायकोमला गेलों आणि जें जें मीं केलें तें तें सर्व त्यांना पसंत पडेल अशी माझी खात्री आहे.''  गांधी टोपीविषयीं त्यांची तक्रार अगदींच पोरकटपणाची होती.  पण त्या काळीं गांधी टोपीच्या उलट सरकारचा मोठा रोष होता हें मात्र खरें.  एखाद्या घरीं एखादा गांधी टोपीवाला पाहुणा आला तरीसुद्धा सरकार त्या घरावर नजर ठेवीत असे, असें मला कळलें.  गांधी टोपी घालावयाचा माझा आग्रहच असेल तर निदान तिचा रंग तरी काळा असावा असा ह्या दहाजणांचा आग्रह होता.  पण ज्या अर्थी ही बाब मोठी तत्त्वाची नव्हती त्या अर्थी मी त्यांची समजूत करण्यासाठीं डोक्यावर कांहींच घालावयाचें नाहीं असें व्रत घेतलें.  तें अद्यापि चालू आहे.  खादी न वारपण्याविषयीं त्यांनीं आपला आग्रह सोडून दिला.  निषेध करणार्‍या त्या दहा सभासदांमध्यें दोन मोठे पोलीस अधिकारी होते.  त्यावरून वारा कुणीकडून वाहात आहे हें मला कळलें.  हें सर्व प्रकरण मीं ताबडतोब साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीकडे पाठवलें.  त्यांनीं माझी बाजू पूर्णपणें उचचली.  साधारण ब्राह्म समाजाच्या अध्यक्षांनीं मंगलोर ब्राह्म समाजाच्या अध्यक्षाला एक स्वदस्तुरचें पत्र लिहून आपल्या मिशनरीचा व प्रतिनिधीचा हा मोठा उपमर्द होत आहे अशी स्पष्ट तक्रार केली.  साधारण ब्राह्म समाजाकडून जी दरमहा नेमणूक मला होती त्यांतील थोडासा भाग (दरमहा २५ रु.) मंगलोर समाजाकडून कलकत्त्यास जात असे.  याशिवाय माझा कोणताही खर्चाचा बोजा मंगलोर समाजावर कलकत्त्यास जात असे.  याशिवाय माझा कोणताही खर्चाचा बोजा मंगलोर समाजावर नव्हता.  पण ही विक्षिप्‍त तक्रार मजकडे आल्याबरोबर मी हा थोडासा भागसुद्धां स्वीकारण्याचें ताबडतोब नाकारलें.  पण हें प्रकरण कांहीं सलोख्यानें मिटेना.

दि. ब. बंगेरा   :   पुढें समाजाचे बिल्लव जातीय सभासद दिवाणबहादुर व सेवानिवृत्त डिस्ट्रिक्ट जज्ज एम. बंगेरा नांवाचे एक गृहस्थ होते.  त्यांच्या भावाच्या मुलीचें लग्न निघालें.  समाजाचा पुरोहित ह्या नात्यानें तें लग्न मीं लावावें अशी रा. बंगरा यांनीं इच्छ प्रादर्शित केली.  रा. बंगेरा ह्यांचे भावी जांवई ह्यांनीं निषेधपत्रकावर सही केली होती.  त्यांनीं आपली सही करत घेऊन मजविषयींचा विश्वास प्रकट करीपर्यंत मला ह्या लग्नविधींत भाग घेतां येणार नाहीं असें मीं स्पष्ट कळवलें.  रा. बंगेरा ह्यांना राग येऊन हें प्रकरण अधिकच चिघळूं लागलें.

अशा वेळीं पुण्याला अहल्याश्रमाच्या नवीन इमारतीचें उद्धाटन करण्यासाठीं मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन ऑक्टोबर महिन्यांत येणार होते.  त्यांच्या स्वागतार्थ मीं पुण्यास यावें असें पुणें शाखेकडून अगत्याचें आमंत्रण आलें, म्हणून मी पुण्यास आलों तो दोन महिने इकडेच होतों.  पुढच्या नाताळांत काँग्रेसची बैठक बेळगांवास झाली.  त्या वेळीं अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषदेची बैठक काँग्रेसच्या मंडपांत झाली.  आंध्र प्रांतीय श्री. रामलिंगम् रेड्डी यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें.  ह्या परिषदेपुढें महात्मा गांधी यांचें मुख्य भाषण झालें.  परिषदेची व्यवस्था करण्यासाठीं पुण्याहून रा. पाताडे मजबरोबर बेळगांवास आले होते.  परिषदेचें काम संपल्यावर आम्ही दोघे गोव्यास गेलों.  एकदोन दिवस तेथें राहून जुनें व नवें गोवें येथील प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं.  जानेवारी १९२५ च्या आरंभीं गोव्याहून मी परत मंगलोरला आलों व पाताडे परत पुण्यास गेले.  दहा निषेधकांचा वाद मंगलोरांत अद्याप धुमसतच होता.  निषेधकांपैकीं कोणीही समक्ष भेटण्यास तयार होईना.  वादाला ते तोंडच देईनात.  रा. के. रंगराव यांना ह्या प्रकाराचा विषाद वाटून ते समाजाच्या अध्यक्षत्वाचा राजीरामा देऊन मद्रासला निघून गेले.  पुढें तीन महिने वाट पाहून कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीची अनुमती घेऊन मी पुण्यास कायमचा राहण्यास परत आलों.  मी, भगिनी जनाबाई व धाकटा चिरंजीव रवींद्र यांना घेऊन नेहमींच्या जलमार्गानें किंवा आगगाडीनें परत न येतां सह्याद्रीच्या घाटांतून मोटारीनें शिमोगा येथें परत आलों.  वाटेंत मूडबिद्री, कारिकळ, आगंबे हीं प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं.  कारिकळच्या टेकडीवरील जैन लोकांचा संतपुरुष 'गोमत्त राजा' याचा ५६ फूट उंचीचा भला मोठा पुतळा पाहिला.  शिमोग्याहून एस. एम. रेल्वेंतून हरिहरला आलों.  तेथील ऐतिहासिक देवळांचें निरीक्षण केल्यावर आम्ही पुण्यास आलों.  ह्या सर्व चित्तवेधक प्रवासाचें वर्णन तत्कालीन मासिक मनोरंजनांत सविस्तर आलें आहे.

बालपण

जन्म  :   आतां माझ्यासंबंधींच्या आठवणींकडे वळातें.  मी इ.स. १८७३ एप्रिल ता. २३ ( शके १७९५ चैत्र वद्य एकादशी ) बुधवारीं दोन प्रहरीं ११ वाजतां जन्मलों.  बाबांनी माझी जन्मपत्रिका इतर सर्व मुलांप्रमाणें रीतसर ज्योतिषाकडून वर्तवून ठेविली आहे.  त्या जन्मपत्रिकेची भाषा अर्धवट संस्कृत व अर्धवट मराठी, पण दोन्ही अशुद्ध त्यामुळें ह्या ज्योतिषीबोवांचे भाषेचेंच नव्हे तर ज्योतिषाचेंही ज्ञान तुटपुंजेंच दिसतें.  त्यांत मी अमुक होईन, तमुक होईन, म्हणून ज्या माझ्या भावी गुणांची लांब माळ ओविली आहे, ती वाचून अद्यापि मला मौज वाटते.  अर्थात् हें भविष्य अशा कांहीं साधारण मोघम भाषेंत आहे कीं, गोळाबेरजेंत तें कोणालाही लागू पडावें.  लहानपणीं मला वाचायला व लिहायला आल्यावर माझ्या पत्रिकेंतील मी मोठा विद्वान् व लोकप्रिय होणार हें भविष्य वाचून मला मोठी फुशारकी वाटे.  अगदीं बालपणीं माझ्या अंगांत बाळसें चांगलें असे.  आतां जरी मी काळा आहें, तरी बांध्यानें व चेहर्‍यानें मी लहान वयांत फार आकर्षक होतों, असें आई मला सांगे.  माझा वडील भाऊ मजपेक्षां रंगानें उजळ, रूपानें जास्त चांगला आणि स्वभावानें शांत होता.  तरी माझ्या बाळशाची व तरतरीपणाची छाप पाहणारावर माझ्या इतर भावंडांपेक्षां अधिक बसे.  दादाभाई डॉक्टर नांवाचा कोणी एक दरबारचा पारशी नोकरी बाबांच्या परिचयाचा होता.  तो पारशी तर मजवर फार लुब्ध होता.  रस्त्यांत कोठेंही भेटला तरी जवळ येऊन तो माझे बरेचसे मुके घेऊन मला बेजार करी, असें आई मला सांगत असे.

एक आपत्ति :   तेव्हां मी फार तर सव्वा-दीड वर्षाचा असेन.  माझे कानांत सोन्याचे सुंदर झुबे घातले होते.  त्याच्या भोंवतालीं लहान मोत्यें लाविलीं होती.  हा दागिना साधाच, परंतु मला फार शोभे.  तो घालतांना कान टोचावा लागला.  त्यांत कांहीं तरी कमीजास्त होऊन माझे कानाला जखम झाली.  डावा कान सुजून त्यांत पू झाला.  आजीला वाटलें कीं, मला कोणाची तरी दृष्ट झाली.  योग्य उपाय न होतां दृष्टीबद्दल बर्‍याच वस्तु ओवाळून टाकण्यांत आल्या.  शेवटीं कानाचा लोंबता भाग कुजून तुटेलसा झाला.  एके दिवशीं मला न्हाऊं घालीत असतांना तो भाग तुटून झुब्यासह खालीं पडला.  मग काय विचारतां !  आजी, आई आणि आत्या ह्यांनी आकांत मांडला.  तेव्हां आजोबा जिवंत होते.  हा प्रसंग आठवण्याइतका मी मोठा झालों नव्हतों.

पहिला लळा  :   तिसर्‍या वर्षापासून मी थोडें थोडें बोबडें बोलूं लागलों असेन.  अगदीं पहिल्या पानावर लिहिलेली माझी आठवण तिसर्‍या वर्षांतली असावी.  मला पहिला लळा आजीचा, बाबांचा किंवा आईचा नसून माझ्या आजोबांचा बसवंतरावांचाच होता.  हिंदु घरांत असें होणेंच साहजिक होतें.  नवरा-बायको तरुण असतात.  मुलाचा आजा-आजी असेतोंपर्यंत त्यांच्यासमोर आपल्या मुलाचें कौतुक आपणच करण्यास त्यांना लाज वाटते.  घरकामामुळें त्यांना फुरसतही मिळत नसते.  आजा-आजी म्हातारीं असतात.  त्यांना काम नसतें.  मुलांचा मोह त्यांनाच जास्त असतो.

धाडशी तांडेल  :   आजी कष्टळू व कडक असल्यानें मी नेहमीं आजोबांच्याच भोंवती असे.  त्यामुळें माझ्या मनावरचे अगदीं पहिले ठसे आजोबांनींच उठविले.  मला अद्यापि चांगलें आठवतें.  आमच्या घराच्या सोप्यांत माझा पाळणा बांधलेला असे.  मला त्यांत बसवून नेहमींप्रमाणें तो आडवा न हालवितां उभा हालवीत.  असा पाळणा हालूं लागला म्हणजे मी नावेंत बसल्याप्रमाणें खालवर हेलकावे खाईं.  अशा हालणार्‍या पाळण्याला मी नावच म्हणत असें.  आजोबा आपल्या ठरलेल्या जागीं सोप्यांत बसून माझे लाड पुरविण्यासाठीं पाळणा उभा हालवीत.  पाळणा जोरांत हालूं लागला म्हणजे मोठ्या धाडसी तांडेलाप्रमाणें मी स्वतःला मोठा धन्य मानीत असें.  भावी ईर्षेचे हे पहिले धडेच नव्हेत काय ?  आजोबा त्या वेळीं वार्धक्यामुळें आंधळे होते.  माझ्या तोंडावरची विजयशाली नावाड्यांची विजयश्री जरी त्यांच्या चर्मचक्षूंना दिसत नव्हती, तरी ती कल्पनाचक्षूनें निरखून ते मला उत्तेजन देत.  त्या वेळीं ते एक बालगीत म्हणत.  त्याचें ध्रुवपद हें असें - ''माझें पकुलें कसें खेळतें !  माझें छकुलें कसें खेळतें !'' तें ऐकून मला धन्यता वाटे !

संवयीचा परिणाम  :   माझ्या बाबांचें नांव रामजी.  आजोबा व आजी त्यांना 'रामा' अशी हांक मारीत.  ती ऐकून मीही बाबांना 'रामा' व आईला 'यमुना' अशा नांवांनींच बोलावीत असें.  कौतुकामुळें कांहीं दिवस वडील मंडळींनीं तिकडे लक्ष दिलें नाहीं.  मी तीनचार वर्षांचा झालों तरी अशींच नांवें घेऊं लागलों.  आजोबांनीं मला बाबा व आई अशा हांका मारण्यास सांगावें, पण तसें म्हणण्यास मला मोठी लाज वाटत असे !  एक दिवस दाराआड उभा राहून मीं 'बाबा' अशी हांक मारली व लाजून आंत पळून गेलों.  सर्वत्र हंशा पिकला.  तेव्हां तर मला या नवीन नांवांची जास्तच लाज वाटायला लागली.  माझ्या बाबांना व आईलाही आपल्या वडिलांसमोर ह्या नांवांनीं हांका मारून घेण्याचें आवडेना !  हा संवयीचा परिणाम !

१८७७ चा दुष्काळ  :   मी चार वर्षांचा झालों त्या वेळीं, म्हणजे इ.स. १८७७ सालीं दक्षिणेंत भयंकर दुष्काळ पडला होता.  तेव्हां चार शेरांची धारण होती असें म्हणतात.  पण त्या वेळीं आमच्या घरांत आबादीआबाद होती.  आमच्या मळ्यांत मक्याचें पीक फार माजलें होतें.  मक्याचीं कणसें आमचे घरांत रचावयास जागा पुरेना.  हीं कणसें शिजवून खाणें आम्हांला आवडत असे.  कणसें खाऊन आम्ही भुरकुंडें बाहेर फेकून देत असूं.  तीं पटकन् उचलून भिकारी लोक फोडून त्यांचा कोंडा खात.  एकदां तर हा कोंडा न पचल्यामुळें एक भिकारी ओकला आणि त्याचा ओकच दुसर्‍या भिकार्‍यानें आधाशीपणानें खाल्ला, हें मीं स्वतःच्या डोळ्यांनीं पाहिलें.  पण मी इतका लहान होतों कीं, दुष्काळ म्हणजे काय याची मला कल्पना नव्हती.  आम्ही कणसें अर्धवट खाऊन टाकीत असूं, म्हणून दारीं भिकार्‍यांची गर्दी जमे.  पण त्यांत करुणेपेक्षां कौतुकच जास्त असे.

चोरटें दान  :   आमचे आजोबा एका ठोकळ्यांत एक शेरभर दाणे घालून कट्टयावर आलेल्या भिकार्‍याला एकेक मूठ भिक्षा घालण्यासाठीं सकाळीं बसत असत.  त्यांना नीट दिसत नसे, म्हणून ठरलेले दाणे संपले कीं, आम्ही लहान मुलें थोडे जास्त दाणे ठोकळ्यांत टाकीत असूं.  ही लबाडी लवकरच उघडकीस येऊन आमच्या ह्या लीलेला आळा पडत असे.  पण आमच्या लबाडीला गरिबांचे दुवे मिळत, हें सांगावयास नको.  त्या वेळीं मी माझेपुढें आलेलें ताट एका दुष्काळी पीडिताला वाढलेलें आठवतें.  चहूंकडे दुष्काळ असतां आमचें हें शेत फार पिकलें.  ह्याचे कारण तें नदीबूड रान होतें.  आजोबांच्या व बाबांच्या उघड दानामुळें व आमच्या लहानपणच्या चोरट्या दानामुळें आमच्या घराण्याचा मूळचा बोलबाला अधिक वाढला.  एरवीं आमच्या शेतांतलें पीक उघडपणें आमच्या घरीं पोंचलेंही नसतें.

बंगलोर शाखा

मागासलेल्या लोकांत, विशेषतः अस्पृश्यवर्गांत त्यांच्या राजकीय हितसंबंधाची जागृति व्हावी म्हणून अस्पृश्यतानिवारक संघ ही स्वतंत्र सहकारी संस्था पुण्यांत १९१७ सालच्या अखेरीस स्थापण्यांत आली.  या संस्थेची जरूरी विशेषतः मद्रास प्रांतीं फार भासली.  पूर्व किनार्‍यावरील मद्रास शहरीं आणि पश्चिम किनार्‍यावर मंगळूर व मलबारांत मिशनच्या शिक्षणविषयक संस्था याच्या अगोदरच कित्यक वर्षे स्थापण्यांत येऊन त्यांचें काम बरें चाललें होतें.  या दोन किनार्‍यांवरील परस्परांची माहिती होऊन त्यांचा संबंध मिशनच्या मातृसंस्थेशीं निकट यावा म्हणून मधोमध बंगलोर येथें आमच्या मिशनची एक नवीन प्रांतिक अंगभूत शाखा स्थापावी, असे विचार माझ्या मनांत १९१८ सालापासून घोळूं लागले.  त्या सुमारास माझे मित्र आणि प्रा. समाजाचे एक जुने सभासद रा. काशीनाथ नारायण देवल यांच्या परिश्रमानें तेथील अस्पृश्यवर्गासाठीं बंगलोर लष्करांत, टॅनरी रोडवर एक दिवसाची शाळा स्थापण्यांत आली होती.  ती मातृसंस्थेस जोडून घ्यावी अशी रा. देवलांनीं मागणी केली होती.  म्हणून मी रा. कृष्णाजी गोविंदराव पाताडे यांस बरोबर येऊन बंगलोरला ऑगस्ट १९१९ मध्यें गेलों.

कृ. गो. पाताडे  :  रा. कृष्णाजी गो. पाताडे ह्या तरुण गृहस्थाची गांठ १९१७ मध्यें मुंबईस प्रथम पडली.  हे राष्ट्रीय वृत्तीचे उत्साही तरुण होते.  ता. ८ नोव्हेंबर १९१७ रोजीं शनिवारवाड्यांपुढें भरलेल्या सभेंत ह्यांनीं भाग घेतला होता.  त्यानंतर त्यांचा पुणें शाखेत प्रवेश झाला.  वर्षदीड वर्षांतच त्यांच्यामध्यें मिशनची स्वतंत्र शाखा चालविण्याइतपत तयारी झाली.  लहानपणीं गिरणींत काम करून रात्रीच्या शाळेंत इंग्रजी सातव्या इयत्तेपर्यंत त्यांनीं अभ्यास केला होता.  गृहस्थ फार हिंमतीचे असत..

तामिळ प्रांतांतील दौरा  ;  ह्या कामीं १९१५ सालीं मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर यांनीं जो दौरा काढला होता त्याचा उत्कृष्ट परिणाम ह्या प्रांतांत झालेला आढळून आला.  आम्ही प्रथम बंगलोरहून सेलम ह्या जिल्ह्याच्या गांवीं गेलों.  तेथें सुप्रसिद्ध राजगोपालाचारी ह्यांचा पुढाकार होता.  त्यांचे मित्र प्रो. यज्ञनारायण ह्यांच्या घरीं उतरलों.  हे मद्रासच्या पाछाप्पा कॉलेजचे प्रोफेसर होते.  राजगोपालाचारी ह्यांनीं एका सार्वजनिक क्लबांत आम्हांला मोठी चहापार्टी देऊन व्याख्यान करविलें आणि पुढें अस्पृश्योद्धारासाठीं त्यांनीं एक स्वतंत्र आश्रम स्थापून प्रत्यक्ष कार्य केलें.  ह्या ठिकाणीं आम्हांस अशी बातमी लागली कीं, तंजावर त्रिचनापल्लीकडे अस्पृश्य व जमीनदारवर्ग ह्यांमध्यें मोठा चुरशीचा लढा चालू आहे.  आम्हीं तो पाहून घ्यावा.  मद्रासला गेल्यावर तेथें चालू असलेलें आमच्या शाखेचें काम तपासलें.  बंगलोरास असतांना सर व्ही. पी. माधवराव ह्या बड्यां गृहस्थानें (बडोद्याचे दिवाण) आमचा सन्मान एक थाटाची गार्डन पार्टी देऊन केला होता.  मद्रासला गेल्यावर तेथील एका हायकोर्टचे न्यायाधिशांनीं एक मोठी गार्डन पार्टी करून आमचा सन्मान केला.  प्रसिद्ध काँग्रेसचे पुढारी व समाजसुधारक श्रीनिवास अय्यंगार यांच्या अध्यक्षत्वाखालीं येथील यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनच्या दिवाणखान्यांत माझें व्याख्यान झालें.  त्या वेळीं मि. अय्यंगार यांनीं आमच्या कामाला मोठा हार्दिक पाठिंबा दिला.  मद्रास येथील गोखले हॉलमध्यें माझें दुसरें व्याख्यान झालें.  त्या वेळीं मिसेस् बेझंट या बाईनें अध्यक्षस्थान स्वीकारून आमच्या कार्याची मनःपूर्वक महती गायली.  यानंतर त्रिचनापल्लीकडे अस्पृश्य व जमीनदार यांच्यांत चाललेल्या लढ्याविषयीं आम्ही कानोसा घेऊं लागलों.  त्या प्रांतांतील बर्‍याच पडिक जमिनी मद्रास सरकारांनीं गरीब पारिया लोकांना फुकट अथवा सवलतीच्या दारानें लागवडीस दिल्या होत्या.  ही गोष्ट तिकडील जमीनदारांना खपेना.  आजवर अस्पृश्यवर्ग म्हणजे केवळ शेतीवरचे गुलाम होते.  जनावरांइतकीसुद्धां त्यांना किंमत नसे.  यामुळें जमीनदारांना मोठी किफायत होत असे.  त्यांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हक्क नसत.  सरकार-दरबारांत कायदेशीर दाद लावून घेण्याची त्यांच्यांत जाणीव नसे.  अशी पुरातन बेबंदशाही चालू असतां हे गरीब लोक ह्यापुढें जर स्वतंत्र शेतकरी म्हणून मिरवूं लागले तर त्या प्रांतींच्या जमीनदारांची धडगत नाही अशी धास्ती जमीनदारांनीं घेतली होती.  प्रकरण मारामारीवर जाऊन रक्तपातही होऊं लागला होता.  अशा वेळीं आम्ही तेथें जाण्याविषयीं सल्ला घेऊ लागलों असतां दुमत होऊं लागलें.  कोणी म्हणत, आम्ही गेलों असतां थोडाबहुत इष्ट परिणाम होईल.  निदान खरी परिस्थिति तरी कळेल; पण बहुतेकांचें मत असें पडलें कीं, ही वेळ बरी नव्हे.  प्रकरण अधिक विकोपाला जाईल.  आमची शारीरिक सुरक्षितताही राहणार नाहीं.  मिशनला धोका पोंचेल.  शेवटीं मी प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड पेटलंडसाहेब ह्यांची खासगी भेट घेऊन सल्ला घेतला.  त्यांनीं प्रेमळपणें स्वागत केलें आणि म्हटलें कीं, ''सरकारनीं या बाबतींत अधिकारयुक्त असा कोणताही सल्ला देणें मुळींच इष्ट होणार नाहीं.  कारण सरकारनेंच ही बाब अस्पृश्यवर्गाला जमिनी देऊन उपस्थित केली आहे.  जुन्या मताच्या व धनिकवर्गीय लोकांत सरकार अप्रिय झालें आहे.  सरकारनें तुमचा पुरस्कार केल्यानें तुम्हांला धोका पोंचेल.  म्हणून काय करावयाचें तें तुम्हीच स्वतंत्रपणें पूर्ण विचार करून ठरवा.  तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल पोलिसखात्यामार्फत सरकार पूर्ण बंदोबस्त राखील.  तुमच्या कामीं यश येवो !''  आम्हांस मोठा पेंच पडला.  दंग्याच्या जागीं प्रत्यक्ष जावें कीं नाहीं हें तेथें गेल्यावर ठरवितां येईल; निदान त्या प्रदेशांत जाऊन आजूबाजूचा प्रकार तरी पाहावा म्हणून आम्ही त्रिचनापल्लीकडे निघालों.

बॅ. जॉर्ज  :  ह्या भागांत मदुरा, तंजावर, त्रिचनापल्ली वगैरे प्राचीन ठिकाणीं सुप्रसिद्ध हिंदु देवालयांच्या अवाढव्य व सुंदर इमारती आहेत.  त्या पाहून आम्हीं आमच्या डोळ्यांचीं पारणें फेडलीं.  मदुरा येथें बॅ. जॉर्ज नांवाचे काँग्रेसचे कट्टे ख्रिस्ती भक्त यांचे घरीं आम्ही उतरलों.  प्रत्येक प्रांतिक कार्याविषयीं यांचा उत्साह अलोट दिसला.  तंजावर, त्रिचनापल्ली इकडे त्यांचीं पत्रें घेतलीं.  या शहरांतील प्रसिद्ध काँग्रेसभक्तांनीं आमच्या मिशनला चांगली सहानुभूति दाखविली.  जेव्हां जेव्हां आम्ही अस्पृश्य व जमीनदार ह्यांविषयीं प्रश्न पुढें काढला तेव्हां तेव्हां हे काँग्रेसभक्त मागें सरून कचरत असत.  कारण ते स्वतःच जमीनदार असत.  पोटापुढें कोणाची मजल जात नाहीं असें म्हणतात तेंच खरें.  त्यांनीं दंग्याच्या जागीं जाण्याच्या निर्धारापासून आमचें मन पूर्णपणें वळविलें.  आम्हांलाही कांहीं निकडीच्या कामासाठीं बंगलोरकडे व मुंबईकडे जाणें भाग होतें.  नाइलाजानें आम्ही हुल्लडखोरीचा मार्ग सोडला.

ख्रिस्त्यांचा कावा  :  या सफरींत आणखी एक मोठा मजेदार अनुभव आम्हांस आला.  रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट पंथाच्या ख्रिस्ती लोकांनीं अस्पृश्यवर्गाच्या असंख्य प्राण्यांना आपल्या जाळ्यांत कोंडून ठेवलेलें आम्हीं प्रत्यक्ष पाहिलें.  ह्या गरिबांचें धर्मांतर करून त्यांचा भौतिक, मानसिक व आध्यात्मिक असा कोणताच फायदा झालेला दिसला नाहीं.  उलट त्या फायद्याच्या मार्गांत मूर्तिपूजक ख्रिस्ती धर्माच्या नांवानें सतिपूजा, रथोत्सव, यात्रा, जातिभेद यांचे भयंकर तट उभारलेले आम्हीं पाहिले.  त्रिचनापल्ली या शहराच्या आसमंतात् ज्या पारिया लोकांच्या कंगाल वस्त्या पाहिल्या त्यांत झोंपड्यांतून क्षुद्र ख्रिस्ती देवस्थानें आम्हीं डोळ्यांनीं पाहिलीं.  खेड्यांतील म्हसोबा, रवळनाथ, सटवाई, जाखाई-जोखाई अशा क्षुद्र हिंदु-दैवतांप्रमाणेंच मेरी, जोसेफ, ख्रिस्त व त्याचे बारा शिष्य यांच्या नांवानें शेंकडों दगड ठेवून त्यांना शेंदूर माखलेला आम्हीं पाहिला.  ख्रिस्ती सणासुदीला हिंदूंप्रमाणेंच रथोत्सवही करीत असतात.  प्रत्येक देवस्थानापुढें लांकडी रथ दिसले.  या गरीब लोकांपेक्षां प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्माची व स्वतः ख्रिस्ताची अशी हालअपेष्टा पाहून आम्हांला कींव आली.  अशा उपायानें अस्पृश्यांनीं ख्रिस्ती अनुयायांचा भरणा केलेला आम्हीं पाहिला.  इतर प्रांतांतील समजूतदार ख्रिस्ती मिशनर्‍यांना ह्या प्रकाराची गंधवार्ता तरी आहे कीं नाहीं, असल्यास ते मूग गिळून स्वस्थ कसे बसतात याचा उलगडा आम्हांस कांहीं केल्या होईना.  हिंदु धर्माप्रमाणेंच ख्रिस्ती झालेल्यांत कडक जातिभेद आहेत.  ब्राह्मण, मुदलियार, पिल्ले, रड्डी, शेट्टी वगैरे हिंदु जाती ख्रिस्ती धर्मानुयायांमध्यें अबाधित कशा राहतील ह्याचीच रोमन कॅथालिक पाद्र्यांना मोठी काळजी पडलेली असते.  लहानमोठ्या ख्रिस्ती उपासनालयांतून ह्या निरनिराळ्या जातींचीं बांकें व दर्जे ठरवलेले असतात.  अस्पृश्य ख्रिस्तांना तर या सर्वच मंदिरांतून शिरकाव नसतो.  त्यांनीं बाहेरूनच रस्त्यांतून अगर अंगणांतून गुडघे टेकून प्रार्थना करावी आणि मोक्ष मिळवावा.  मात्र हिंदु धर्मांत त्यांनीं पुन्हां जाऊं नये.  ख्रिस्ती अनुयायांत त्या प्रांतीं स्वतंत्रतेची मोठी चळवळ चालली होती.  ती दाबून टाकण्यासाठीं रोमहून एक मोठे धर्माधिकारी पोपसाहेब आले होते.  ही शिस्तीची परंपरा सर्वांनीं मानावी असा अखेरचा फतवा मागें ठेवून हे आलेले बडे अधिकारी परत गेले असें माझ्या ऐकण्यांत आलें.

रेडा आणि माणूस  :  एके दिवशीं तिसरे प्रहरीं त्रिचनापल्लीच्या मोठ्या रस्त्यांतून जात असतां म्युनिसिपालिटीचा कचर्‍यानें भरलेला एक मोठा गाडा मोठ्या कष्टानें रखडत चाललेला आढळला.  त्याला एका बाजूला एक रेडा व दुसर्‍या बाजूला एक माणूस जुंपलेला आढळला.  हा काय चमत्कार म्हणून जवळ जाऊन शोध करतां माणसानें उत्तर दिलें कीं, ''मी जातीनें पारिया पण धर्मानें रोमन कॅथालिक आहे.''  जात व धर्म कोणताही असो, माणसानें रेड्यांची मजल गांठली हें पाहून आम्ही थक्क झालों !  रेड्यांचा तुटवडा पडतो म्हणून माणसांना असलीं कामें करावीं लागतात.  धर्मांतर केलेल्या पारियांची ही भौतिक उन्नति !  असे आम्हीं अनुभवलेले अनेक प्रकार एका फूलस्केप कागदावर छापून त्याच्या अनेक प्रती आम्हीं चोहोंकडे वांटल्या; पण त्याला उत्तर म्हणून कोणाचेंच आलें नाहीं.  आम्हीं पाहिलेला प्रकार कितीही कडू असो, तो खरा आहे असें मानून आम्ही स्वस्थ राहिलों आणि स्वदेशीं आलों.  या सफरींत जागोजागीं जो आमचा गौरव झाला, तो आमचा नसून आमच्या कार्याचा होता.  पुढें जे अप्रतिष्ठेचे प्रकार अनुभवास आले ते या गौरवापेक्षां आमच्या कार्याला अधिक प्रोत्साहक ठरले.

प्रस्तावना

माझ्या आठवणी व अनुभव

भाग १, २ व ३

लेखक :
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

प्रस्तावना

महर्षि अण्णासाहेब शिंदे यांना मी प्रथम पाहिले ते इ. स. १९३३ मध्ये.  उमरावतीला आले असताना तेथील ब्रह्मविद्या-मंदिरात त्यांचे एक व्याख्यान झाले.  त्या व्याख्यानाला मी हजर होतो.  त्या वेळी त्यांच्या व्यक्तित्वाचा जो परिणाम माझ्यावर झाला तो विसरणे मला शक्य नाही.  त्यांच्या नावाचा व कार्याचा परिचय पूर्वी झालेलाच होता.  तशात, मला वाटते, त्यांचे ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हे पुस्तक त्या वेळी नुकतेच प्रसिद्ध झालेले होते.  ते वाचून त्यांच्या तीव्र तळमळीचा, व्यापक अवलोकनाचा व सूक्ष्म संशोधनाचा ठसा अंतःकरणावर आधीच उमटलेला होता.  त्यामुळे त्यांना पाहण्याची व त्यांचे भाषण ऐकण्याची उत्कट इच्छा होती.  ब्रह्मविद्या-मंदिरात व्याख्यानासाठी उभी असलेली त्यांची ती मूर्ति पाहून जणु एखादा प्राचीन महर्षि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे असे वाटले.  एकंदर देहयष्टि धिप्पाड, वर्ण काळा, चेहर्यावरील भाव शांत, जणु शून्य संशोधन करीत असलेले डोळे, या सर्वांना भव्यता प्राप्त करून देणारे मानेवर रुळणारे पांढरे शुभ्र केस व दाढी यामुळे अंतःकरणाला समाधान वाटले.  त्यांच्या भाषणाच्या शांत लयीमुळे आणि विशेषतः त्यातील उन्नत विचारांमुळे ते अधिक वाढले.  त्यांचे भाषण शेवटपर्यंत मी अत्यंत शांतपणे ऐकले.  व्याख्यानानंतर, त्यांची ओळख करून घ्यावी म्हणून विनीत भावाने मी त्यांच्या जवळपास जाऊन उभाहि राहिलो.  तथापि त्यांच्याबरोबर इतर काही सज्जन बोलत राहिल्यामुळे मला त्यांची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची संधी त्या दिवशी मिळाली नाही.... आणि माझ्या दुर्दैवाने, पुढेहि कधी तो योग जुळून आला नाही याची मला आता राहून राहून खंत वाटते.
महर्षि शिंदे यांचे नांव निघाले की आणखी एका प्रसंगाचे स्मरण होऊन मला वारंवार खंत वाटते - तोहि प्रसंग उमरावती येथे आणि ब्रह्मविद्या-मंदिरातच घडून आला.  ता. २ जानेवारी १९४४ रोजी अण्णासाहेबांनी आपली इहलोकची यात्रा संपवली, ही बातमी प्रसिद्ध होताच मनाला फार दुःख झाले.  त्यांना श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी एखादी शोकसभा भरवली जाणे आवश्यक होते.  उमरावती येथील प्रतिष्ठित पुढा-याकडून या बाबतीत काही हालचाल होईल अशी अपेक्षा मी करीत होतो.  पण दोन तीन दिवस उलटून गेले तरी तसा योग जुळून येण्याची कांही लक्षणे दिसेनात.  जणु शिंदे यांना उमरावतीतील हे पुढारी पूर्णपणे विसरून गेले होते.  एके दिवशी श्री. गवइ यांची गाठ पडली.  भेट होता क्षणीच त्यांनीहि माझ्या मनातील विचार बोलून दाखविले.  त्यानंतर त्यांनीच पुढाकार घेऊन ब्रह्मविद्या-मंदिरात (या वेळी त्याला जोशी सभागृह हे नाव देण्यात आले होते) एक शोकसभा घेतली.  पण त्या सभेला पुरते वीस-पंचवीसहि लोक नव्हते.  अर्थात् शोकसभेचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला हे खरे; तथापि ते एकंदर दृश्य पाहून मनाला वाईट वाटल्याखेरीज राहिले नाही.

या उपेक्षेची मीमांसा अनेक दृष्टींनी करता येईल, याची मला जाणीव आहे.  तसे पाहिले तर खुद्द अण्णासाहेबांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांची धडाडीची सार्वजनिक कामगिरी सुमारे १९३३ च्या अखेरीसच संपली.  त्यानंतरची ११ वर्षे जवळजवळ शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याप्रमाणे त्यांची स्थिति होती.  या कालावधीत सामान्य लोक त्यांचे नाव आणि कामगिरीहि विसरले असल्यास ते कित्येकांना स्वाभाविक वाटेल.  एखादा कार्यकर्ता आपल्या सार्वजनिक कर्तृत्वाने जोपर्यंत जनतेसमोर एकसारखा चमकत असतो तोपर्यंत लोकहि त्याची वाहवा करीत असतात; आणि कर्तव्याच्या क्षेत्रातून थोडा काळ का असेना तो दूर होताच त्याला ते विसरतात हि लौकर.  काळाच्या हातातील विस्मृतीच्या कुंचल्याने मोठमोठ्यांच्या जीवनचित्रावर हात फिरवले जात असल्याचे आपण एरवी पाहात नाही काय ? तशात अण्णासाहेबांनी उभी हयात ज्या कार्यात घालविली ते अस्पृश्योद्धाराचे कार्य स्पृश्य आणि त्यातूनहि वरिष्ठ वर्णांना मनापासून रुचण्यासारखे होते असे नाही.  ज्या अस्पृश्यांसाठी त्यांनी जिवाचे रान केले, खुद्द त्यांच्यातच राजकारणाचे नवीन वारे शिरले आणि म्हणून तेहि जिथे अण्णासाहेबांची उपेक्षा करू लागले होते तेथे इतरांच्याकडून अधिक सहानुभूतीची अपेक्षा कशी करता येईल ?  तशात त्यांच्या मुख्य कार्यक्षेत्रापासून उमरावती किती तरी दूर !  अण्णांच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची शाखा उमरावतीस होती ही खरे, पण अस्पृश्यवर्गातील नवीन राजकारणाच्या झंझावातामुळे ती जवळजवळ मोडून पडल्यासारखीच होती.  अशा स्थितीत उमरावती येथे भरविलेल्या शोकसभेचे करुणास्पद दृश्य पाहून खरे म्हटले तर कुणीहि एवढे काही मनाला लावून घेता कामा नये !

ही स्थिति फक्त उमरावती-नागपूरकडचीच आहे असे नाही, मुंबई-पुण्याकडचीहि हीच स्थिति आहे.  पुण्या-मुंबईला कदाचित् त्या वेळी मोठमोठ्या शोकसभा झाल्या असतील आणि त्या दिवशी अनेकांनी अण्णासाहेबांवर स्तुतिसुमने उधळली असतील - पण त्यानंतर ?  सर्वत्र सामसूम !  ज्या मराठा समाजात ते जन्मले तो त्यांच्याविषयी उदासीन आहे, ज्या दलित समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याला त्यांचे आज महत्त्व कळत नाही, आणि राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाशी सूत न ठेवता ज्या राष्ट्रीय पक्षाला ते मिळाले त्याच्या महाराष्ट्रीय वारसदारांनी सोयीस्कर रीतीने त्यांची उपेक्षा चालविली आहे.  वाङ्मयाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांची कामगिरी अगदीच उपेक्षणीय आहे असे नाही; पण खास पुण्यात भरणार्या साहित्य-संमेलनांच्या व्यासपीठावरून जेथे अति सामान्य व्यक्तींच्या चोपड्यांचा आवर्जून गौरव केला जातो तेथे अण्णासाहेबांचा किंवा त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा नुसता उल्लेखहि होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव आहे.  इतक्या थोड्यां कालावधीत अण्णासाहेबांना महाराष्ट्राच्या उपेक्षित मानक-यात जाऊन बसण्याचे भाग्य लाभलेले पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.  तथापि उपेक्षेचे हे वातावरण अगदी सर्वत्र पसरलेले आहे असे नाही.  व्यापक सहानुभूतीच्या काही दूरदर्शी पुरुषांनी हीं उणीव भरून काढलेली आहे यात शंका नाही.  महाराष्ट्र-राष्ट्रभाषा-सभेच्या दिनदर्शिकेत २ जानेवारीचा दिवस ‘महर्षि शिंदे स्मृतिदिन’ म्हणून निर्देशिलेला आहे.  प्रा. श्री. ना. बनहट्टी यांनी त्यांना १९४८ मध्ये आपली आदरांजलि वाहिली आहे.  महाराष्ट्राने श्री. शिंदे यांच्या केलेल्या उपेक्षेसंबंधीचे त्यांचे विवेचन येथे उद्धृत करण्यास हरकत नाही.  ते म्हणतात-

“विठ्ठल रामची ऊर्फ अण्णासाहेब शिंदे हे महाराष्ट्राचे एक उपेक्षित मानकरीच म्हटले पाहिजेत.  पुण्याचे एक व्यासंगी प्राध्यापक गं. बा. सरदार यांनी ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ म्हणून एक पुस्तक लिहिले आहे, त्यात त्यांनी चिपळूणकरांपूर्वी होऊन गेलेल्या भाऊ महाजन, विष्णुबुवा ब्रह्मचारी इत्यादि थोर कार्यकर्त्यांची माहिती देऊन महाराष्ट्र या कार्यकर्त्यांना बहुतांशी कसा विसरला आहे, हे दाखवून दिले आहे.  ही विसरण्याची क्रिया चिपळूणकरांपूर्वीच्या लोकांनीच फक्त आचरून दाखविली आणि त्यानंतर मात्र आपण जागृत आणि स्मरणशील बनलो, अशातली गोष्ट नाही.  आपणा महाराष्ट्रीयांचा तोच स्वभाव कायम आहे.  आपण गुणांचे पूजक नाही; व्यक्तीचे पूजक आहो.  एकाद्या व्यक्तीच्या मागे आम्ही लागलो म्हणून तिला आभाळापर्यंत उंच चढवतो, तिच्या पायावर लोटांगणे घेतो, तिला जयजयकाराने गुदमरवून सोडतो, तिच्या मूर्ति स्थापून तिची विटंबना करतो, आणि ज्यांचे गुण आपणाला खरोखरी अनुसरण्यासारखे असतात अशा इतर अनेक थोर कार्यकर्त्यांना आपण विसरतो; इतके की त्यांचे नामोनिशाण देखील शिल्लक ठेवीत नाही.  आमच्या राष्ट्रीय मूर्खपणाची ही एक खूण आहे…..”

अशा स्थितीत प्रा. बनहट्टी यांनी अण्णासाहेबांचे पुण्यस्मरण करण्यात मनाचे मोठेपण दाखविले हे केव्हाहि त्यांना भूषणावह होय.  गेल्या जोनवारीत ‘महाराष्ट्राचा एक कर्मवीर’ म्हणून अग्रलेख लिहून ‘मराठ्या'चे संपादक आचार्य अत्रे यांनीहि त्यांचे पुण्य-स्मरण महाराष्ट्राला करून दिले.  अशी चिन्हे तुरळक असली तरी अनास्थेचे व उपेक्षेचे जौळ दूर सारण्याला त्यांची मदत होते हे खरे आहे.  असा एक मोठा हृद्य प्रसंग माझ्या अनुभवाला आला होता, तो येथे सांगणे अप्रासंगिक होणार नाही.  दोन तीन वर्षापूर्वी एक तरुण गृहस्थ माझ्या भेटीला आले.  कै. शिंदे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासंबंधी त्यांनी माझ्याजवळ गोष्ट काढताच मला सानंद आश्चर्य वाटले.  मी आस्थापूर्वक चौकशी केल्यावर मला कळले की, हे तरुण गृहस्थ म्हणजे नागपूर येथील प्रसिद्ध अस्पृश्य पुढारी कै. किसन फागूजी बंदसोडे यांचे चिरंजीव होत.  कै. बंदसोडे हे नागपूर येथील भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते.  १९४४ मध्ये नागपूरला मी बदलून आल्यावर त्यांच्याशी माझा परिचय झाला.  त्यांच्या भाषणातून आण्णासाहेबांच्या विषयी जो नितांत आदर व्यक्त होत होता त्यामुळे माझे अंतःकरण भरून आले होते !

कोणी म्हणतील की, “अण्णासाहेबाविषयीच्या उपेक्षेची इतक्या विस्ताराने चर्चा करण्याचे कारणहि नाही.  स्वतः अण्णासाहेब यशापयशाच्या कल्पनांच्या पलीकडे गेलेले कर्मवीर होते.  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदा च न’ या वृत्तीने ते आचरण करीत. ‘माझ्या कामात यश मिळाले नाही..... यशाची मला आकांक्षाच नव्हती.  यशाची मला नीट व्याख्याच करता येत नाही,  तर मी त्याची इच्छा तरी कशी करू ?’  असे त्यांनीच म्हटलेले आहे.  त्यांच्या स्थितप्रज्ञतेचा हा पुरावाच नाही काय ?”  हे म्हणणे किंचित् खरे असले तरी या उद्गारातून त्यांचे हळुवार मानवी अंतःकरण व्यक्त होत आहे असे मला वाटते.  आपल्याला आलेल्या अनुभवांचे सार सांगतांना ते म्हणतात, “माझ्या कामात माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठी मी घरदारहि कमी समजून ती ती कामे करीत होतो त्यांचाहि माझ्यासंबंधी गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधहि झाला.  हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय.  ह्यामुळे माझ्या मनाची शांति ढासळली आणि अकाली बहुतेक स्वीकृत कामातून मी विराम पावलो.”  हे निराश झालेल्या अंतःकरणाचे उद्गार आहेत यात शंकाच नाही.  उद्गारांची थोडी मीमांसा या ठिकाणी करणे अप्रासंगिक होणार नाही.

अण्णासाहेबांच्या जीवितातील सर्वातिशायित्वाने उठून दिसणारे महत्त्वाचे कार्य कोणते हा प्रश्न सामान्य जनतेला विचारला तर ‘अस्पृश्यांची उन्नति’ असेच उत्तर बहुतेक देतील.  पण खुद्द अण्णांना हा प्रश्न घातला तर ते काय म्हणतील ?  त्यांचेच उद्गार पाहा : “...... मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामातून मी विराम पावणे शक्यच नाही; कारण मी धर्माचा स्वीकार केला हे खरे नसून, धर्मानेच माझा स्वीकार केला अशी माझी समजूत असल्यामुळे ह्या शरीरातून विराम पावेपर्यंत तरी धर्माने मला पछाडले आहेच व पुढेहि तो मला अंतरणार नाही ही मला आशा आहे.”  या उद्गारावरून अण्णासाहेब ‘धर्माचा प्रचार’ हे आपले ‘अस्सल काम' मानत होते असे दिसून येईल.  त्या मानाने त्यांची इतर कार्ये दुय्यम ठरतात.  या दृष्टीने पाहता त्यांनी अंगीकारलेले अस्पृश्योद्धाराचे कार्यहि दुय्यम ठरते.  पण लौकिक दृष्टीने तर तेच त्यांचे जीवितकार्य होय.  तेव्हा याचा समन्वय कसा करावयाचा ?  मला वाटते, याचे उत्तर असे देता येईल की, अण्णासाहेबांनी चालविलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य त्यांच्या अंतःकरणातील धार्मिक वृत्तीतून निर्माण झाले होते.  धर्मभावना हा मूळ पाया आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य ही त्यावर उभारलेली इमारत होय.  माझे हे म्हणणे सत्याला अगदीच सोडून नाही.  १९१२ मध्ये त्यांच्या मित्राने त्यांचे जे एक त्रोटक चरित्र लिहिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, “हीन मानलेले लोक हे आपले बंधु आहेत, ही भावना अंतःकरणात दृढ करून घेऊन ते जे काम करीत आहेत त्याचा पाया धर्म हाच आहे.  त्यांच्या शाळातून धर्मशिक्षण देण्यात येते, भजन होते, उपासना होतात व सद्धर्माची गोडी लावण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न होत असतात.१” “'मिशनचे कार्य धर्माच्या पायावरच चालावयाचे होते२” असे खुद्द अण्णासाहेबांनीहि स्पष्ट केले आहे.  हा धार्मिक पाया ब्राह्मधर्माचा होता अशी काहींनी समजूत करून घेतलेली दिसते, पण ते बरोबर नाही.  अण्णासाहेबांनी प्रार्थना-समाजात सामील होऊन ब्राह्मधर्माचा प्रचार चालविला होता हे खरे आहे.  तथापि अस्पृश्योद्धाराचे कार्य करताना या अस्पृश्यांना ब्राह्मधर्मात ओढण्याचा त्यांचा मुळी सुद्धा हेतु नव्हता.  “मिशनचे कार्य धर्माच्या पायावरच चालवावयाचे होते” असे सांगून अण्णासाहेब लागलीच स्पष्ट करतात “मात्र, अस्पृश्यवर्गातून समाजाला सभासद मिळावे असा हेतु समाजाने कधीच बाळगला नाही आणि अशी तक्रारहि कधी कोणी बाहेरच्यांनी केली नाही.”  असे असले तरी त्यांच्या कार्याविषयी असे गैरसमज होत होते असे दिसून येते.  अण्णासाहेब शिंदे यांच्याप्रमाणे अस्पृश्योद्धाराचे कार्य करणारे कै. प्रा. माटे हे आपल्या चित्रपटा’त लिहितात.  “विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कामाची काय पद्धति आहे, याचे मी बारकाईने अवलोकन केले.... इतक्या दिवसानंतर सुद्धा लिहिताना मला कसेचेच वाटते; पण लिहावयास हवे म्हणून लिहितो की, शिंदे यांचे ब्रह्मसमाजी धोरण व त्यास अनुसरून त्यांनी घातलेली कामाची पद्धति मला आवडेना.  जनसेवा करावयास किंवा विचाराला औदार्य प्राप्त करून घेण्याला आपल्या जुन्या धर्माच्या पोटात पुरेसा वाव आहे, असे मला वाटे व जर ही अस्पृश्य प्रजा हिंदु धर्माची, तर आपण चळवळ सुद्धा पूर्वकालीन विचारधनाच्या ऐपतीवरच चालवावी असे वाटे.  मूर्तिपूजेला ब्रह्मसमाजात कोठेहि स्थान नाही म्हणून अस्पृश्यांच्या प्रश्नातील देवालय-प्रवेश हा जो भाग त्या बाबतीत आपल्या तत्त्वाशी बेइमान न होता शिंदे यांना चळवळ करता येण्यासारखी नाही, असे मला वाटे.”  पा. २५८) प्रा. माटे यांच्या या मतांचा समाचार घेण्याचे हे स्थल नाही.  पण शिंदे यांच्या कार्याविषयी सूक्ष्म गैरसमज कसे करून घेण्यात येत होते याचे उदाहरण म्हणून ही वाक्ये उद्धृत केली आहेत.  मला वाटते अशा प्रकारच्या गैरसमजांमुळेच, आपले कार्य अयशस्वी झाले असे अण्णासाहेबांना वाटत असावे.

Read more: प्रस्तावना

पोरवयांतील माझी धर्मभावना

प्रस्ताव  :  हायस्कूलचा काळ, इ.स. १८९१ अखेर म्हणजे माझ्या वयाचीं अठरा वर्षे तेथपर्यंत माझा अभ्यास, खेळ, खोड्यां सोबत्यांचा सहवास व माझा एकान्तवास वगैरे गोष्टी उघडपणें मीं सांगितल्या.  आतां जी धर्मभावनांची आठवण मी सांगणार आहें तो विषय गंभीर आहे.  इतकेंच नव्हे तर तो माझ्या चरित्रांतला आत्मा आहे.  धर्मानें माझ्या आयुष्याचा प्रवाह, निदान त्याची दिशा तरी, पुढें पार बदललीं.  अशा महत्त्वाच्या विषयासंबंधीं लिहिण्यापूर्वी धर्माविषयीं माझी दृष्टि कशी आहे तें सांगणें जरूर आहे.  मी केवळ आठवणी व मागील अनुभव लिहीत असतां मध्येंच माझीं आतांची दृष्टि किंवा विचार देणें आगंतुक विषयांतर आहे, हें मला कबूल आहे.  पण माझी दृष्टि समजल्याशिवाय मी धर्माविषयीं जें लिहीन तें वाचकांस न समजतां कदाचित् गैरसमज होण्याचा संभव आहे.  म्हणून हें विषयांतर क्षम्य आहे, असें मला वाटतें.

इतर गोष्टी वेगळ्या आणि धर्म ही बाब वेगळी, अशी पुष्कळ सुज्ञांचीही समज असते.  पण इतर गोष्टींप्रमाणेंच मनुष्यमात्रांत धर्माची जी उपजत बुद्धि आढळते तीही परिणतीचा व विकासाचा विषय आहे असें मला वाटतें.  म्हणजे तीही नैसर्गिक नियमांना अनुसरूनच उपजते, वाढते आणि कदाचित् लयही पावते.  खाणें, पिणें, वाचन, अभ्यास, मैत्री, वैर, खेळ, खोड्यां, संपत्ति, विपत्ति वगैरे गोष्टी केवळ निसर्गाच्या नियमांप्रमाणें घडतात.  त्यांना कांहीं ईश्वरी प्रसादाची किंवा प्रेरणेची गरज नाहीं.  मात्र धर्माच्या जागृतीला आणि वाढीलाच काय ती ईश्वरी कृत्याची जरुरी आहे, असें मला वाटत नाहीं.  अशी जरूरी माझ्या धर्मबुद्धीला असेल तर ती माझ्या पाळण्यांतल्या खेळांना आणि पोरकट खोड्यांना कां नसावी ?  मीं जें बरें केलें असेल, तेवढीच नेमकी ईश्वरी कृपा आणि वाईट गोष्टींना मात्र मीच जबाबदार, असें माझें मत नाहीं.

आपल्या चारित्र्याबद्दल व्यक्तीच सर्वस्वीं जबाबदार असेंही माझें म्हणणें नाहीं.  जशी व्यक्ति जबाबदार आहे तसाच त्या व्यक्तीचा अनुवंश (पूर्वपरंपरा) आणि परिस्थिति (हिच्यांतच त्या व्यक्तीचें शिक्षण, नातलग, स्नेही, वैरी वगैरे सर्वच नैसर्गिक बाबींचा समावेश होतो.)  ह्याही गोष्टी जबाबदार आहेत.  एकूण मनुष्याच्या चारित्र्याबद्दल व्यक्ति आणि निसर्ग हीं दोनच कारणें पुरीं असून, ईश्वराला त्यामध्यें खेंचणें अनावश्यक दिसतें.  दांडगाई, मारामारी आणि माझ्या दुष्ट खोड्यांच्या आठवणी ज्या लेखणीनें आणि ज्या ओघांत लिहिल्या त्याच लेखणीनें आणि त्याच ओघांत मी माझ्या धर्माचाही विषय लिहितों, हें पाहून कोणा वाचकाचें कोवळें मन प्रथमच बिचकुं नये आणि पुढेंही ज्या सहज आणि मोकळ्या मनानें माझीं व्यंगें मीं सांगितलीं तशाच मोकळेपणानें माझ्या धार्मिक भावनांचा अहवाल मी सांगत आहें हें वाचून कोणाच्या कोवळ्या विचारांना धक्का लागूं नये, म्हणून मध्येंच ही थोडी प्रस्तावना केली आहे.

स्पष्टोक्ति  :  शिमग्यांतल्या माझ्या ९।१० वर्षांच्या वयांतल्या अश्लील लीला वाचून किंबहुना १४।१५ वर्षांच्या वयांत जुन्या शृंगारिक कादंबर्‍या वाचून हुरळलेल्या माझ्या मनाला, ''कारंज्याचे तुषार वाटति अग्निकणांचे परी'' हा भपकेदार अनुभव आला अशी माझी स्वतःचीच जबानी वाचून कोणी सूज्ञ वाचक, मी त्या वेळीं मोठा बदफैली होतों असें अनुमान काढणार नाहीं.  त्याचप्रमाणें पुढें मी ज्या माझ्या पोरधर्माच्या कहाण्या सांगणार आहें त्या वाचून मी जन्मसिद्ध संतशिरोमणि होतों, असेंही कोणी अनुमान काढण्याचें कारण नाहीं.  कच्च्या दिलाच्या, अर्धवट विचारांच्या व पक्षपाती वाचकांसाठीं माझ्या आठवणी मुळींच नाहींत, हें सर्वांनीं ध्यानांत ठेवावें.

बागुलबोवा  :  धर्म हा विषय बुद्धीपेक्षां भावनेचा अधिक असल्यानें आणि तो विकासशीलही असल्यानें मी ह्या बाबतींतील माझ्या आठवणींना अगदीं माझ्या पाळण्यापासून सुरवात करतों.  मी तान्हें बालक असतांना ज्या पाळण्यांत उताणा निजत असें तो पाळणा आमच्या घराच्या सोप्यांत टांगलेला असे.  साधारणपणें पाळण्यावर कांहीं खेळणीं अगर भपकेदार रंगीबेरंगी बेगडी झिळमिळ्या बांधण्याचा मातांना शोक असतो.  माझ्या पाळण्यावर तसलें कांहीं बांधलेलें मला आठवत नाहीं.  पण माझें लक्ष पडल्या पडल्या वरच्या छताकडे जाई.  नेमकें पाळण्याच्या वरतीं असलेल्या एका वेळूला एक चमत्कारिक गांठ होती.  तिच्याकडे मीं नेहमीं निरखून पाहीं.  ती मला एका दाढीवाल्या बोवाच्या मुखवट्याप्रमाणें भासे.  मी माझ्या आईचें अंगाईचें गाणें ऐकूनही लवकर निजलों नाहीं आणि कामाखालीं बेजार झालेल्या आईला तर मला निजवावयाची घाई झाली म्हणजे शेवटीं आईनें मला बागुलबोवाची भीति घालावी.  इकडे आईनें केलेला बागुलबोवाचा उल्लेख आणि वरतीं ह्या वेळूच्या गांठींत दिसणार्‍या बुवाची व माझी दृष्टादृष्ट झाली म्हणजे माझा लय त्याच्याकडे विशेषच लागे आणि माझें रडणें थांबे.  कारण ही वेळूची गांठ म्हणजेच बागुलबोवा अशी भीति आणि आश्चर्य ह्या भावनांनीं मिसळलेली माझी कोवळी समजूत होऊन माझा वर लय लागे !  मी निजलों असें समजून आई कामाला जाई; पण मी इकडे जागाच असें, ह्या वेळीं मी फार तर २।-२॥ वर्षांचा असेन.  ही माझ्या आयुष्यांतील अगदींच पहिली आठवण !

पहिली धर्मभावना  :  पुढें वर्ष-सहा महिन्यांनीं मी किंचित् बोबडें बोलूं लागल्यावर त्या वेळूच्या गांठीकडे बोट दाखवून 'बागुलबुवा' तोच काय ?  असें मी आईला विचारीही व ती हांसून 'होय' म्हणे !  पण हें बागुलबोवाचेंच नव्हे तर माझ्या पहिल्या देवाचें दर्शन होय, हें मला आतां कळतें.  तेव्हां मलाच माझें मन कळत नव्हतें, तर तें माझ्या साध्या-भोळ्या आईला कोठून कळणार ?  माझाच नव्हे तर अखिल मानवजातीचाही पहिला देव बागुलबुवाच असतो, हें मला पुढें ऑक्सफर्ड विश्वविद्यालयांतील मँचेस्टर कॉलेजांत तुलनात्मक धर्माच्या अभ्यासानें कळलें.  व्यक्तींत असो किंवा मानवजातींत असो धर्मविकासाच्या पायर्‍या जवळजवळ त्याच आहेत, ह्या सिद्धान्ताला माझी ही बाळआठवण किती पोषक आहे !   Fear of God is the beginning of all knowledge ह्या बायबलांतल्या जुन्या करारांतील म्हणीलाही माझी आठवणच जोराची साक्ष देते.  मात्र ह्या नव्या बागुलबुवाचा प्रथम परिचय घडतांना मनामध्यें केवळ भीतिच वाटत नसू, भीति थोडी पण आश्चर्य जास्त अशी कांहींशी नवीनच मित्र भावना उत्पन्न होत होती.

धर्माची गोडी  :  ह्यापुढील चार वर्षांत म्हणजे मी सात वर्षांचा होईपर्यंत घरांतल्या कुळाचारांत आणि विधिसंस्कारांत देवापेक्षां देवीउपासनेचें प्राबल्य अधिक असे.  माझे आजोबा बसवंतराव विशेष धार्मिक नव्हते.  संताबाई ही माझी आजीच धर्मकृत्यांत पुढाकार घेत असे.  आमचे घरीं नवरात्राचा सण आणि सोहळा सर्वांत मोठा होत असे.  नवरात्रांत माझी आजी नऊ दिवस उपास करीत असे.  केवळ फळांवर, तींही थोडीं केळीं खाऊन ती असे.  तिचें मुख्य दैवत श्रीयल्लमादेवी हिचें वर्णन मागें आलें आहेच.  तुळजापूरची अंबाबाई माझ्या आजोबांची व यल्लमा ही माझ्या आजीची, वस्तुतः पहिलीपेक्षां दुसरी मला अधिक पसंत असण्याचें कांहीं कारण नाहीं.  असलेंच तर आजीचा पुढकार एवढेंच.  जितका गाजावाजा अधिक किंवा जितकें गोड खावयाला ज्याच्या पूजेंत अधिक मिळेल तितकें तें दैवत लहान मुलाला अधिक प्रिय, हा नियम निसर्गसिद्धच आहे.  वैदिक दैवतांत इंद्र अधिक प्रिय आणि प्रबल कां ?  तर तो दाूर अधिक पीत असे म्हणून.  ती इंद्रालाही प्रिय अशी समजूत रूढ झाली असावी.  ह्या न्यायानें मला ही यल्लमा ५।६ वर्षांपासूरन प्रिय झाली.  मनावरचा हा संस्कार मी पुढें इंग्रजी पांचव्या इयत्तेंत असतांनाही मला कसा जाणवला, हें मीं मागें सांगितलेंच आहे.

ताईबाईचें प्रस्थ  :  आमच्या देव्हार्‍यावर आणि नवरात्राच्या पूजेंत तुळजापूरच्या अंबाबाईचें चित्र आणि आरत्या अधिक येतात.  ह्याचें कारण श्रीयल्लमा ही कानडी देवता आणि तिची उपासना अधिक ग्राम्यपणाची.  आमचे घरचे पुरोहित तम्मण भटजी डेंगरे ह्यांना अंबाबाईच्याच मराठी व कानडी आरत्या येत असत, पण सौंदत्तीपेक्षां तुळजापूर अधिक लांब आणि जमखंडीस अंबाबाईच्या देवळापेक्षां श्रीयल्लमाचेंच देऊळ अधिक प्रसिद्ध व शिवाय माझ्या आजीचा करारीपणा जास्त.  म्हणून ती जिवंत असेपर्यंत माझ्या बाबांनीं पुढें सुरू केलेल्या ब्राह्मणी संस्कृतीला विशेष बळ आलें नाहीं.  देव्हार्‍यावरच्या श्रीयल्लमापेक्षांही बाहेरच्या गोठ्यांतील कोनाड्यांत बसलेली ताईबाई हिचें प्रस्थ वर्षांतून एक दिवस इतकें माजे कीं, आम्ही सर्वजण त्या दिवशीं अगदीं हैराण होऊन जात असूं.  आम्ही सर्वजण शाकाहारी असूनही केवळ नवसासाठीं म्हणून ह्या ग्राम्य ताईबाईची, एक गाभण मेंढी कापून आजीला कंदुरी करावी लागत असे.  आमचे आजोबा जरी मोठे भाविक नव्हते, तरी तेच एकटे मांसाहारी असल्यामुळें ताईबाईची ही पूजा त्यांच्या पथ्यावर पडे.  आजाआजींचें सर्व ठीक झालें, तरी मला हें काय गौलबंगाल चाले तें कळत नसे !  तें कसेंहि असो, यल्लमामुळें माझ्या मनावर अनुकूल परिणाम होत, तर ताईबाईकडे पाहून प्रतिकूल ठसे उमटत !

सूडाची कल्पना  :  मी लहानपणीं इतका खोडकर होतों तरी फार कनवाळू होतों.  ह्या ताईबाईला बळी देण्यास आणिलेल्या गाभण मेंढीची मला मोठी कींव येत असे.  पण माझा इलाज तो काय चालणार ?  माझ्या देखत त्या बिचार्‍या जिवाचा घात झालेला पाहून मला ह्या ताईबाईचा मोठा राग येत असे.  तरी दुसरे दिवशी इतर देवांबरोबर तिचीही पूजा मला मुकाट्यानें करावी लागत असे.  ह्या ताईबाईचें उणेंपुरें करण्याचा मार्ग जरी नव्हता, तरी तिचा सूड उगविण्याची मला दुसरी एक चमत्कारिक संधि मिळत असे, ती अशी.  आमच्या वाड्यांच्या महाद्वाराच्या बाहेर दाराशी लागून दोन्ही बाजूंस दोन तिकोनी दगड ठेविलेले असत.  त्यांना चुना लावलेला असे.  प्रसंगविशेषीं त्यांना हळद-कुंकुंही लागत असे.  ह्या दोन द्वारपालक देवताच असत म्हणावयाच्या.  दिसण्यांत आकृतीनें हे दगड ताईबाईप्रमाणें आणि तेवढेच असत.  मला वाटे कीं, हे ताईबाईचे कोणी तरी नातलग असावेत.  त्या दुष्ट ताईबाईवरचा माझा राग मी केव्हां केव्हां त्या बिचार्‍या बाहेर ठेवलेल्या दगडांवर मनमुराद काढून घेत असें.  त्यांना मी एकमेकांवर चांगले ठेंचून काढीत असें.  मी त्यांना उलटें ठेवीं, पालथे पाडीं.  पण कांहीं केलें तरी मेलेली मेंढी पुन्हां थोडीच जिवंत होणार होती !  मारून माझेच हात दुखरे झाले, म्हणजे मला हा खुळा नाद सोडावा लागे.

यथासांग पूजा  :  ह्या ताईबाईसारखीच आमच्या वाड्यांच्या अगदीं बाहेरच्या अंगणांतील वायव्येकडील एका पडक्या खोलींतील खांबाचीही मला लहानपणीं पूजा करावी लागत असे.  हें रमाबाई नांवाच्या एका मृत बाईचें भूत होतें.  येणेंप्रमाणें आमचे घरीं माणसांपेक्षां देवदेवतांची गर्दी फार मोठी जमली होती.  नवरात्रांत, गणेशचतुर्थी वगैरे महापूजेचा प्रसंग आला म्हणजे देवघरांतील देव्हार्‍यावरील खंडोगणती टाकांची व मूताअची पूजा झाल्यावर, मग उतरंडीच्या डेर्‍यांची (गाडग्यांची), नंतर देव्हार्‍यासमोरच्या कोनाड्यांत ठेवलेल्या लाकडी पादुकांची, जवळच्या खिडकींत रचून ठेवलेल्या सर्व पोथ्यांची, स्वयंपाकघरांत येऊन ताक करण्यासाठीं रोवलेल्या खांबाची, सोप्यांतील मुख्य कोनाड्यांत बसविलेल्या गणपतीची, गोठ्यांत बसलेल्या ताईबाईची आणि शेवटीं अगदीं बाहेर पायखान्याजवळील खोलींतील वर सांगितलेल्या खांबाची ऊर्फ भुताची पूजा अनुक्रमें करावी लागत असे.  ही पूजा म्हणजे ताम्हनांतून नेलेल्या पाणी, गंध, अक्षता, फुलें वगैरेंनीं करावयाची असे.  शिवाय हें झाल्यावर धूपारती, दीपारती आणि कापरारती ओवाळायला पुन्हां ह्या इतक्या देवतांसमोर यावें लागे.  ही आरती ओवाळतांना उजव्या हातानें आरती ओवळणें आणि डाव्या हातानें घंटा वाजविणें ही कसरत एकाच वेळीं करावी लागत असे.  आणि पुष्कळ वेळां-विशेषतः गोड नैवेद्यामुळें अगर शाळेला सुटी असल्यामुळें मी खुषींत असलों तर-ही सर्व पूजा यथासांग करणें मला आवडतही असे.

मारुतीची पूजा  :  मराठी चौथ्या-पांचव्या इयत्तेंत असतांना बाबांनीं घरचें पुजारीपण मजकडेच दिलें होतें.  ह्या मूर्तिपूजेंत माझें मन जरी केव्हां केव्हां रमत असे, तरी रोज रोज हें सर्व नियमानें करण्याचें लचांड मागें लागल्यामुळें मी बहुतेक फार कंटाळत असें.  ह्याचें कारण असें कीं, आमची मराठी शाळा सकाळीं ७ पासून १० पर्यंत आणि पुन्हां दोन प्रहरीं २ पासून ५ पर्यंत असे.  उन्हाळ्याचे दिवसांत सकाळीं शाळेंतून आल्यावर कडकडीत भूक लागलेली असायची.  तरी पण मला आंघोळ करून सोवळ्यानें ही सर्व पूजा करावी लागे.  इतकेंच नव्हे तर घरांतील सर्व पूजा आटोपल्यावर मग गांवच्या मारुतीचे देवळांत जाऊन त्याची पूजा करून यावें लागे.  मारुतीला जातांना सोवळ्यानें जावें लागे.  स्नान करून अंगाला व कपाळाला गंध लावून उजव्या हातांत पळी-पंचपात्री, त्यांत पाणी, फुलें, तिचे बाजूला गंधाचा मोठा गोठा लावलेला, डाव्या खाकेंत धुतलेल्या उपरण्याची घडी, अशा थाटानें आमची वामनमूर्ति मारुतीला निघावयाची.  सुमारें ११।१२ वाजतां उन्हाळ्यांतलें तें कर्नाटकी ऊन पडे, पण अनवाणीच जावें लागे.  मारुतीचें देऊळ बरोबर बाजारांत आमच्या हायस्कुलासमोरच होतें.  तेथून आल्यावर मारुतीचें तीर्थ घरीं सर्व मंडळींना पळीपळीभर द्यावें लागत असे.  हें एक माझी पूजेची हजेरी लावण्याचें साधन बाबांनीं करून ठेविलें होतें !  इतकें झाल्याशिवाय मला जेवायला मिळत नसे.  पूजेला ब्राह्मण ठेवल्यास कोठल्याही देवस्थानांत त्याला चमचमीत नैवद्याचें खावयाला आणि वर भरपूर दक्षिणा असते.  मला मात्र इतकें सारें करून जेवतांना नुसती कोरडी भाकर, तुरीची पातळ डाळ आणि तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी ह्याशिवाय कांहीं मिळत नसे.  चटणीवर तेलही मिळावयाची मारामार !  मग माझ्या कोवळ्या मनावर ह्या पूजेचा काय परिणाम होत असेल बरें ?

गाड्यांची पूजा  :  अर्थात् मला ह्या सर्व पासरीभर देवांचा केव्हां केव्हां भारी राग येत असे.  पूजा करीत असतां सगळे देव माझ्या हातींच येत.  जे दगडाचे कठीण असत ते वांचत; पण जे सोन्यारुप्याचे नाजूक टाक असत त्यांना मी धरधरून वांकवीत असें आणि पुन्हां बाबांनीं पाहूं नये म्हणून सरळ करून ठेवीं.  घाई झाली म्हणजे दुरूनच मी त्यांच्यावर पाणी फेकून भिजवीत असें.  घरांतल्या देवांचा असा झटपट संक्षिप्‍त समाचार घेतल्यावर मारुतीचीही तशीच वाट लागावयाची.  घरांतून निघतांना पंचपात्री, गंध, फुलें, अक्षता सर्व शृंगार थाटाचा असावयाचा; पण पोटांत कावळे चावूं लागल्यावर कोण मारुतीपर्यंत जातो ?  आमचें मोठें अंगण ओलांडल्यावर बाहेर रस्त्त्यांत लगेच म्हातारबा नांवाच्या माझ्या बाबांच्या एका सुतार मित्राच्या मालकीचा सुतारी कारखाना लागत असे.  त्यांच्याकडे दुरुस्तीला आलेल्या खटारगाड्यां रस्त्यांतच उभ्या असावयाच्या.  त्यांपैकीं एखाद्या गाडीच्या चाकाच्या गड्डयाची पूजा करून मी घरीं तीर्थ द्यावयाला येत असें; पण माझी ही चोरी फार दिवस न लागतांच उघडकीला आली.  म्हातारबा वरचेवर बाबांना भेटावयाला येत असत.  ते म्हणत, ''रामा !  (माझ्या बाबांपेक्षां वयानें बरेच वडील असल्यानें ते अशी एकेरी हाक मारीत) आमच्या रस्त्यांत उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकांवरून अलीकडे बरेच दिवस पाणी, गंध, फुलें, अक्षता आढळतात.  हा काय चमत्कार !''  बाबांनाही हें काय गौडबंगाल आहे तें पाहावेंसें वाटल्यावरून ते पाहावयास गेले.  पाहतात तों आपल्या घरचीं गंध व फुलें नित्याचीं त्यांच्या ओळखीचीं दिसलीं.  घरी येऊन त्यांनीं मला दरडावून विचारलें, ''कायरे विठ्या, रस्त्त्यांतल्या गाड्यांची पूजा करीत असतोस काय ?''  कांहीं झालें तरी मी खरें बोलणारा मुलगा, अशी बाबांचीं नेहमीं खात्री होती.  म्हणूनच त्यांचा मी लाडका होतों.  मी मोठा खजील झालों व खरा प्रकार सांगितला.  त्यांच्या रागाला वावच न उरल्यामुळें त्यांना उलट माझी कींव आली आणि खरें बोलण्याबद्दल त्यांनीं माझें कौतुकच केलें.  गोष्ट अशा थरावर आली म्हणजे माझे आईलाही मध्यस्थी करण्याचें धैर्य होई.  शाळेंत जाणार्‍या लहान मुलाला जेवणाला उशीर होतो, म्हणून तिनेंही मला पाठबळ दिलें.  शेवटीं माझ्या मागची मारुतीची ब्याद सुटली.  मारुतीपेक्षां मला रस्त्यांतली गाडीच पावली म्हणून मीही आनंदलों.  मग त्यापुढें देव्हारांतल्या सोन्यारुप्याच्या टाकांच्या कंबराही मीं फारशा वांकविल्या नाहींत.  कारण केव्हां तरी बाबा पूजा करावयास आले म्हणजे सगळ्या देवांच्या कंबरा वांकलेल्या पाहून त्यांना चमत्कार वाटे.  हे देव म्हणजे आमचे आजे, पणजे हे पूर्वजच असत.  ते सर्व म्हातारे होऊन वारले होते.  म्हणून त्यांच्या कंबरा वांकणें साहजिकच होतें.  असल्या पुजार्‍यापासून आमचें रक्षण कर, अशी त्यांनीं ईश्वराजवळ प्रार्थना केली असावी.  म्हणून त्यांची व माझी ह्या अवेळीं पूजेच्या चरकांतून सुटका झाली !  मूर्तिपूजा ही पहिल पायरी म्हणून तिचें मंडन करणार्‍यांनीं हा एक धडा घेण्यासारखा आहे.  कांहीं असो, बाबांनीं पूजा करणें अगर न करणें केवळ माझ्याच मर्जीवर सोंपवून आपला समंजसपणा प्रगट केला व त्याचा सुपरिणाम असा झाला कीं, माझ्या धर्मबुद्धीला कायमचा धक्का पोंचला नाहीं.

भिंतीवरील थाप  :  पुढें आई मला केव्हां केव्हां पूजा करावयाला सांगे.  पण आईला झुकांड्यां द्यावयाला मला कितीसा उशीर लागणार ?  स्वयंपाकघरांतल्या भिंतीवर मी खडूनें एकदां मोठ्या अक्षरानें खालील वाक्य लिहून ठेविलें होतें.  ''आई !  मी उद्यां पूजा करतों, बरें !''  दुसरे दिवशीं आईनें मला टोंकलें.  ''कां रे विठू, आज पूजा करणार ना ?''  मी काय, मुलखाचा चवचाल पोर्‍या !  मी तिला म्हणे, ''आई, माझें वाक्य नीट वाच.  मीं आज पूजा करण्याचें कबूल केलें नसून उद्यां करण्याचें ठरविलें आहे ना ?''  तो उद्यां आज कधींच येणें शक्य नव्हतें.  ''लिहिणें वाचणें शिकलीं म्हणजे मुलें कशीं चावट होतात बाई !''  असें म्हणून आई बिचारी गप्प बसे.  भिंतीवरील वाक्य माझ्या अवखळपणाचें स्मारक म्हणूच कित्येक दिवस तसेंच राहून गेलें.  प्रत्यक्ष बाबाही तें पाहून न पाहिल्यासारखें करीत.  ''हें पोर पुढें कोणाचे हातीं सांपडणारं नाहीं.''  असें भाकीत ते आईपुढें करीत.  दोघेंही माझें मला नकळत कौतुक करीत व स्वस्थ बसत !

  1. पुनर्घटना
  2. परत प्रवास
  3. पदवीग्रहण
  4. निवडणूक
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
Page 44 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी