1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

श्रीशाहू व नाना

प्रो. जदुनाथांनीं वरील विषयावर जीं दोन विधानें केलीं, त्यांपैकीं पहिलें त्यांच्या अब्रूला शोभण्यासारखें नाहीं, हें पहिल्या अंकांत सांगितलें. आतां दुसरें त्याहूनहि धाडसाचें विधान साम्राज्याची कल्पना मराठ्यांच्या डोक्यांत त्यांनींच (पेशव्यांनीं) भरवून दिली. त्यांनींच मराठ्यांस साम्राज्य व संपत्ति मिळवून दिली. ह्यासंबंधीं संक्षेपानें विचार करूं.
वरील विक्षिप्त वाक्यांत ज्या शब्दांची व अर्थांचीहि ओढाताण झाली आहे ते “पेशवे” व “मराठे” “साम्राज्य” “संपत्ति” “कल्पना” हे होत. “पेशवे” ह्याचा पेशवेपदावर ज्या ज्या व्यक्ति व घराणीं आलीं तीं सर्व असा व्यापक अर्थ किंवा नुसतें एक भट घराणें असा रूढार्थ, असे दोन अर्थ आहेत. “मराठे” म्हणजे महाराष्ट्रांत राहणा-या मराठे ब्राह्मण इत्यादिपासून महारमांगांपर्यंत सर्व जाती असा विकृत अर्थ आणि महाराष्ट्रांत किंवा बाहेर राहणारे “मराठे” क्षत्रिय राष्ट्र किंवा जात असा साधा सरळ अर्थ, असे दोन होऊं शकतात. ह्या दुस-या दोन अर्थांनीं प्रो. जदुनाथांनीं वरील दोन “पेशवे” व “मराठे” हे शब्द योजिले आहेत, ह्यांत शंका नाहीं. “साम्राज्य” म्हणजे इतर राज्यावरचें एक मध्यवर्ती राज्य असा व्यापक किंवा उत्तर हिंदुस्थानांतील दिल्लीचें पातशाही पद असाहि विशिष्ट अर्थ होऊं शकतो. ‘संपत्तीच्या’ अर्थाला सीमाच नाहीं. त्यांत रामदासाच्या झोळीचाहि समावेश होऊं शकतो. ह्या शेवटच्या अर्थानें पाहतां मराठ्यांसच काय, पण हल्लींच्या वैभवशाली युरोपियन सम्राटांनाहि ही झोळीची संपत्ति ब्राह्मणांशिवाय किंबहुना शेवटच्या दिवट्या पेशव्याशिवाय मिळवून देणारा कोणीच समर्थ नाहीं. हें मला जदुनाथांपेक्षांहि अधिक माहीत आहे. तरी पण वरील चारी शब्दांचा शेवटच्याशिवाय इतर कोणत्याहि अर्थानें विचार करतां, जदुनाथांचें म्हणणें साफ खोटें आहे, इतकेंच नव्हे तर हल्लींच्या ताणलेल्या परिस्थितींत विनाकारण जातीजातींतील वैमनस्य वाढविणारें आहे, असें माझें मत आहे.
पेशवे म्हणजे मराठे नव्हत, ह्याची जाणीव बाबूजीला पूर्ण होती हें त्यांच्याच तुलनेवरून स्पष्ट होतें, चित्पावन ब्राह्मण कोंकणांतून शाहूच्या वेळीं वरती घाट ओलांडून नुकतेच येऊं लागले होते, हेंहि त्यांना माहीत असावें. देशस्थ ब्राह्मण त्यांचा अगदीं हलक्या जातीप्रमाणें तिरस्कार करीत, असें त्यांनीं आपल्या शिवचरित्रांत पान ४८२ वर म्हटलें आहे. उलट शिवरायाच्या खासगी चरित्राविषयीं व हिंदुस्थानांत हिंदूंचें स्वराज्य स्थापन करण्याच्या यशस्वी कामगिरीविषयीं ह्या पुस्तकाच्या शेवटीं त्यांनीं आपला अभिप्राय दिला आहे. इतकेंच नव्हे, तर शेवटच्या पानावर हिंदूंना छत्रपति ऊर्फ सम्राट होतां येतें हें शिवाजीनें शिकविलें, असें जो जदुनाथ म्हणतो, तोच पान ४८२ वर पेशव्यांनीं ह्या छत्राचा नाश केला, असेंहि म्हणतो. हा ग्रंथ जदुनाथानें सन १९१९ त लिहिला. त्यावर पांच वर्षें उलटतात न उलटतात तोंच, हेच जदुनाथ आतां म्हणतात कीं, ह्याच पेशव्यांनीं मराठ्यांस साम्राज्य व संपत्ति दिली ! हें काय गौडबंगाल आहे, ईश्वर जाणे ! मेलेल्या स्वराज्यसंस्थापक छत्रपतीपेक्षां जिवंत स्वराज्यवादी ब्राह्मणी वर्तमानपत्राच्या संपादकाला सामान्य लोक भितात; पण ही ग्राम्य भीति जदुनाथासारख्या निस्सीम इतिहास-भक्ताला वाटावी, हा केवळ कालमहिमा ! “मराठे” म्हणजे हीन जातीय (Low Castes). महाराष्ट्र म्हणजे जातिभेदानें सडलेला, हल्लींप्रमाणें श्री शिवारायाचे वेळीं देखईल तो जातवार दृष्टीला वाहिलेला इ. इ. कांहीं अंशीं अल्प दृष्टीनें व बाकीच्या अंशीं क्षुद्र बुद्धीनें जदुनाथानें काढलेले उद्गार त्याच्या “शिवाजी आणि त्याचा काल” ह्या पुस्तकांत आढळतात. शिवाजी शूद्र होता; त्याचें राजकीय ध्येय अगदीं आकुंचित होतें; तो आणखी पुष्कळ दिवस जगला असता, तरी पेशव्यांच्या काळीं त्याच्या राज्याचा जो नाश झाला, तो त्याला चुकवितां आला नसता; वगैरे ह्या बाबूनें बिनधोक म्हटलें आहे (पान ४८२). जणूं काय, शिवाजी परशुरामाहून चिरंजीव झाला असता, तरी पेशवे हे २२ वे वेळीं पृथ्वी निःक्षत्रिय करण्यास अवतरणारच, ही विधिघटना आजच्या ह्या बंगाल्याला कळून चुकली आहे. जणूं पेशवे शिवाजीच्या पांचवीला पुजलेच होते.
प्रो. जदुनाथ कांहीं म्हणो न म्हणो, इ. स. १६६४ त श्रीशिवरायानें प्रसिद्धपणें आपल्यास राजा म्हणविलें व इ. स. १६७४ त पुनः आपल्यास छत्रपति ऊर्फ पातशहा म्हणवून विधिपूर्वक अभिषेकहि करून घेतला. प्रथम प्रथम जरी मराठे त्याच्या विरुद्ध गेले, तरी बहुतेक मराठे आपलें सर्वस्व अर्पून प्रमुखपणें आणि देशस्थ ब्राह्मण, शेणवी, प्रभू आणि महार ह्या चार जाती त्याला आपापल्या मगदुराप्रमाणें साह्य झाल्या. पहिल्या बाजीरावाला पेशवाईचीं वस्त्रें मिळेपर्यं किंवा फार तर त्याचा मुलगा नानासाहेब श्रीशाहूच्या मरणामुळें निरंकुश होईपर्यंत महाराष्ट्राला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद म्हणण्याइतका बाधक झाला नाहीं. ह्याचें सर्व श्रेयहि श्रीशाहूसच आहे. ह्या श्रेयामुळें प्रत्यक्ष शाहूला तरी मरेपर्यंत विश्रांति मिळाली नाहींच; पण तो मेल्यावर लगेच सबंध भोसले घराण्याची विलक्षण वाताहत झाली. ती अशी कीं, त्याच्या प्रत्यक्ष वारसांस कायमचा तुरुंगवास, एकुलत्या एक बायकोस देहान्त शिक्षा, कोल्हापूर छत्रपतीस कायमचा शह, आणि नागपूरच्या भोसल्यास महाराष्ट्राबाहेर एक प्रकारची हद्दपारी मिळाली. भोसल्याइतकींच प्रसिद्ध नसलीं, तरी तितकींच खानदानी मराठ्यांचीं इतर जीं तेजस्वी घराणीं होतीं, तीं नष्ट झाली किंवा मागें पडलीं. घोरपडे, जाधव, आंग्रे, दाभाडे इ. इतिहासकर्त्या खानदानी मराठ्यांची ही गति, तर मग देशस्थ ब्राह्मण, शेणवी, प्रभू, महार वगैरेंचा काय कथा ! श्रीशाहूच्या श्रेयांचा आणि मुलुखगिरीवर कधीं न गेल्याचा फायदा एका भाग्यशाली व प्रसंगदक्ष भट नांवाच्या चितपावन घराण्यानें पूर्ण घेतला. ह्या घराण्यानें शिंदे, होळकर, धारचे पवार, पुरंदरे, पटवर्धन, भानू. इ. नवीन घराणीं उठवून त्यांच्या साह्यानें बरीच राष्ट्रीय कामगिरी केली ह्यांत कांहीं संशय नाहीं. पहिल्या बाजीरावापर्यंत झालें तें झालें; पण तो निवर्तल्यावर रघूजी भोसल्यानें बाबूजी नाईक बारामतीकर ह्यास पेशवा करा, अशी श्रीशाहूस सल्ला दिली. तेव्हां रघूजीनें स्वतः सेनापतित्व स्वीकारून शाहूच्या हुकुमतीखालीं साम्राज्य स्थापण्याची हमी घ्यावी, अशी अट घातली असतां, १८ वर्षांचा पोर नानासाहेब पेशवे यानें काय केलें असतें, हें मुत्सद्दी शाहूनें पाहावयाचें होतें. ह्या १८ वर्षांच्या पोराहून, रघुजी हे खास वयानेंच नव्हे, तर अनुभवानें वृद्ध, स्वभावानें शांत, धोरणी, करारी व निर्व्यसनी मुत्सद्दी होता. इतकेंच नव्हे तर सर्व आयुष्य मुलुखगि-या करून साम्राज्यसंस्थापनेंत पुढें महादजी शिंद्यानें जी कामगिरी केली, तशी कर्नाटकांत व बंगाल्यांत करून शाहूची त्यानें खात्री केली होती. जर काय व्यंग असेल, तर तें इतकेंच कीं, तो शाहूच्या अस्सल जातीचाच नव्हे, तर घराण्यांतला जवळचा आप्त असल्यानें डोईजड होईल, अशी भीति होती. पण शाहूच्या मांडीवर लोळणारा मानसपुत्र पहिला बाजीराव कोठें डोईजड झाला नव्हता ? दाभाड्यासारख्या प्रत्यक्ष सेनापतीला दाबण्यांत “ध” च  “मा” बाजीरावानें केला, म्हणून गंगाजळ निर्मळ उमाबाई दाभाडीपुढें बाजीरावाचा गळा आणि नागवी तलवार ठेवून, शाहूलाहि हात जोडून उभें राहावें लागलें नाहीं
काय ? तें असो. पण १८ वर्षाच्या पोराला म्हणजे मानसपौत्र नानाला पेशवाई देऊन तीन वर्षें झालीं नाहींत, तोंच त्यानें प्रतिनिधीच्या वरिष्ठ पदाला निर्माल्यवत् केलें; गायकवाडाचें तोंड दाबलें, रघूजी भोसल्याला भंडा-याच्या लढाईंत अगदीं लुटलें, आणि प्रत्यक्ष करवीर छत्रपति श्री संभाजीला थाप दिली (नव्हे गुप्त तह केला) कीं शाहूचे मरणानंतर करवीरकरांनाच सातारा आणि कोल्हापूरचीं अशीं दोन्हीं सिंहासनें देतों ! संभाजीशीं हा गुप्त करार, नाना आणि चुलता चिमाजी अप्पा ह्या दोघांच्या सह्यांनीं दिला. तो लेख नंतर ४२८ असा होता. “सातारचें राज्य स्वामीचें; आणि एक-छत्री शिक्का महाराजांचा (संभाजीचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे, तो बाह्यात्कारी आम्ही त्यांचे; परंतु अंतर्यामीं स्वामीचे, शाहू महाराज ह्यांनीं कैलासवास केल्यावर दोन्ही राज्यें स्वामीचीं आणि आम्ही सेवक स्वामीचें” ! भट घराण्याच्या बढतीसाठीं उर्फ साम्राज्यस्थापनेसाठीं नानानें जीं अघटीत कृत्यें केलीं, तीं सर्वच का त्यानें शाहूला कळवून केलीं ? अशा मानस पौत्रालाच पुनः ज्या शाहूनें आपले पंचप्राण व आपल्या वंशाचे गळे देऊन, वरती कोल्हापून घराण्याचा दत्तक घेऊं नका, असें स्पष्ट बजाविलें, तो मातीआड झाल्याबरोबर नानांचा बंडखोर भाऊ सदाशिवराव जेव्हां करवीर छत्रपतीकडे फितूर होऊन, त्यांची पेशवाई पटकावूं लागला तेव्हां साम्राज्याच्या एकीच्या सबबीवर तुमचा पेशवाहि मीच होतों, म्हणून स्वतः नानासाहेब कोल्हापुरास लाळ घोटूं लागला. हे केवढा मुत्सद्दीपणा ! अगदीं कडेलोट !!
वर घडलेल्या उलट्या सुलट्या अनेक प्रकारांबद्दल मी भट घराण्याला किंबहुना नानासाहेबालाहि दोष देत नाहीं. पण जदुनाथ बाबूला मी विचारतों कीं, ह्यांतील निदान हे उलटे प्रकार जर घडून आले नसते, तर काय मराठ्यांना साम्राज्य व संपत्ति मिळाली नसती ? ज्या सरदेसाईंनीं आपल्या मराठी रियासत भाग २ पान ५ वर नाना आणि चिमाजीचा करवीर छत्रपतीशीं गुप्त करार दिला आहे, त्यांनींच, शाहूनें वृद्ध आणि पराक्रमी रघुजी भोसल्यापेक्षां १८ वर्षांच्या नानावर अधिक विश्वास दाखविल्याबद्दल महाराजांची पाठ थोपटली आहे; आणि ते आतां सर्व जगास आव्हान करीत आहेत कीं, “महाराष्ट्रांत दुसरी कोणती व्यक्ति जास्त कर्तृत्ववान् होती, हें पेशव्यांच्या आक्षेपकांनींच दाखविलें पाहिजे !” पण मी नानासाहेबांचा आक्षेपक म्हणून नव्हे तर अंशतः चहाता म्हणून सरदेसायांना विचारतों कीं, नानाच्या १८ व्या वर्षींच त्याला असले आगाऊ अजिंक्यपत्र देण्याचा मोह सरदेसायांना कां सुटतो ? तरुण चित्पावनांना (पहिला बाजी व नाना) सात खून माफ, तर वृद्ध रघूजीकडून निदान एक खून होईपर्यंत तरी त्यावर विश्वास ठेवण्यास काय हरकत होती ? बरें, रघूजीनें तरी पेशवाईसाठीं आपले दांत कोठें विचकले होते ? ती मागणी बाबूजी नाईक ह्या भट घराण्याच्या व्याह्यासाठींच केली ना ?
हा आकस धरून शाहूला न कळवतांच नानांनीं रघूजीवर उत्तरेकडे हल्ले चढविले. तेव्हां जवळच्या कारभा-यांनीं शाहूजवळ तक्रारी पुष्कळ केल्या; त्यांचा काय परिणाम झाला ? “ब्राह्मण माजले; भोसले लुटले, म्हणाले महाराजांनीं दोन दिवस ऐकोन उत्तर केलें. माझे ब्राह्मणांनीं लाथा मारल्या तरी पुरवले, परंतु त्यांची सावली लागत नाहीं. मद्यप्राशन करून दौलत बुडविलें.” शेवटल्या वाक्याचा संदर्भ लावतांना जे सरदेसाईस, पाँडिचरीच्या गव्हर्नरकडून रघूजीला दारूच्या बाटल्यांचा नजराणा आला, त्या बाटल्या रघूजीच्या बायकोला आवडल्या, येवढ्यावरून द्राविडी प्राणायाम करीत बसले आहेत, तेंच पुनः गोविंदपंत बुंदेले उत्तर हिंदुस्थानांतून पेशव्याकडे “पोरी, चिजा, उंची वस्त्र इ.” पाठवित असत, असा घाणेरडा आरोप रा. राजवाडे करितात, म्हणून राजवाड्यांवर रागावतात, ह्याची मोठी मौज वाटते. इतकेंच नव्हे तर नानांनीं उत्तरेंतून एक पत्र पाठविलें आहे, त्यांतील त्यांचा रंगेलपणा, शृंगार, रसभिज्ञता व विद्वत्ता पाहून सरदेसाई उलट त्यांचें फार कौतुक
करितात ! “प्यारी ! तूं गोड तर तुझें कुत्रेंहि गोड” अशांतलाच हा कांहींसा विलायती प्रकार दिसतो. असो. तरी आजकालच्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची भुरळ आमच्या चार दिवसांच्या बंगाली पाहुण्यावर कां पडावी, हा प्रश्न तसाच उरला.

शैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा

हिंदुस्थानांतील भागवत धर्माच्या विकासाचा किंवा इतिहासाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे, ह्याविषयीं थोडीबहुत कल्पना वरील विंवेचनावरून येण्यासारखी आहे. अत्यंत प्राचीन उपास्य दैवत म्हणजे शक्ति अथवा देवी. तिच्यानंतर शिव अथवा रुद्र-शिव हीं उपास्यें आर्य लोकांचा हिंदुस्थानांत शिरकाव होण्यापूर्वींच येथें होतीं. द्राविड ब्राह्मण व द्राविड क्षत्रिय सर्व हिंदुस्थानभर किंबहुना बलुचिस्थानांतहि होते. त्यांचीं दैवतें हींच होतीं. राम, कृष्ण, भीष्मादिकांचींहि हींच दैवतें होतीं. नंतर वासुदेवांनीं बहुदेवांची उपासना टाकून एकांतिक धर्म संस्थापिला. देवकी पुत्र वासुदेवाला ह्या धर्माची दीक्षा घोर आंगिरस ह्यानें दिली. कृष्णानें आपल्या गुरूला जी दक्षिणा दिली ती छांदोग्य उपनिषदाच्या तिस-या अध्यायाच्या १७ व्या खंडांतील ४ थ्या श्लोकांत अशी सांगितली आहे : “अथ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचनमिति ता अस्य दक्षिणा” ह्यावरून दान, तप, आर्जव (सरळपणा), अहिंसा, सत्य वचन हीं पांच तत्त्वें कृष्णाच्या भागवत धर्मांत होतीं. तींच पुढें जैनांच्या व बौद्धांच्या भागवत धर्मांत उतरलीं. पण हीं नैतिक तत्त्वें वैदिक धर्मांचीं नसून मूळ भागवत धर्माचीं होतीं हें ध्यानांत ठेवलें पाहिजे. श्वेताश्वेतर उपनिषदांत शिव हे एकांतिक उपास्य आणि हीं पांच लक्षणें अधिक रूढ झालेलीं दिसतात. मात्र हें उपनिषद ऊर्फ शिवगीता ही बौद्धांच्या बरीच नंतरची आहे ह्यामुळें बौद्ध धर्माचाहि परिणाम तिच्यावर झाला असावा. तिच्या काळापर्यंत ब्राह्मणांवर क्षत्रियांचाच वरचष्मा होता. जनक, भीष्म, कृष्ण, राम, (दाशरथ), कृष्णद्वैपायन (व्यास), महावीर, सिद्धार्थ (बुद्ध), अशोक मैर्य वगैरे क्षत्रिय केवळ राज्यकर्तेच झाले नाहींत तर धर्मसंस्थापक आणि प्रवर्तकहि होते, म्हणून भगवद्गीतेच्या काळापर्यंत त्यांची “नाराणां (विभूति) नराधिप” अशी कीर्ति साक्ष देत आहे. परंतु जेव्हां जैनांनीं व बौद्धांनीं वेदांची परंपरा झुगारून दिली; इतकेंच नव्हे तर वेदान्ताचें मुख्य तत्त्व जो ब्रह्मवाद तोहि टाकून नुसतें ब्रह्मचर्य म्हणजे प्रज्ञा, शील, समाधि इ. नैतिक तत्त्वें प्रत्यक्ष आचरणांत आणण्याविषयीं आग्रह धरूं लागले; तेव्हां त्यांच्या उलट पुष्कळ ब्राह्मण आणि जुन्या मताचे क्षत्रियहि जाऊं लागले. इतकेंच नव्हे, सम्राट अशोकांनीं जेव्हा ह्या नैतिक भागवत धर्माला राजाश्रय दिला, तेव्हां त्यांच्या घराण्यालाच नव्हे तर सर्व जगांत वणव्याप्रमाणें परसरणा-या बौद्ध धर्मालाहि आग लावणारे निखारे त्याच्या अस्तनींतूनच बाहेर पडले. त्यांचा विरोध नुसता जैनांशीं व बौद्धांशींच नसून, शिव-भागवतांशीं व क्षत्रियांशीं देखील होता म्हणून मौर्यांचा उच्छेद करणारें जें शुंग, कण्वादिकांचें ब्राह्मणी राजकारण पुढें आलें, त्यामुळें पूर्वीं जो वासुदेव-भागवतांचा धर्म होता, त्यांचा संस्थापक वासुदेव हा विष्णूचा अवतार होता असें अवतारमत पुढें ढकलण्यांत आलें. त्यामुळें प्रत्यक्ष वासुदेवहि मागें पडून विष्णूच पुढें आला. हा अवतारवाद श्वेताश्वेतर उपनिषदांत नाहीं; किंबहुना मूळच्या भगवद्गीतेंतहि नव्हता. कारण हे दोन्ही ग्रंथ मुळीं सांप्रदायिक ग्रंथच नव्हत. शैव (पाशुपत), वैष्णव (पांचरात्र) इ. सांप्रदायिक मतें ह्या अवतारवादामुळेंच निघालीं; ह्यामुळें भगवद्गीतेचेंहि पहिलें वासुदेवप्रधान स्वरूप जाऊन विष्णु-प्रधान हें स्वरूप बनलें. आणि भागद्गीतेंत वासुदेवाला विष्णूचा अवतार आणि परब्रह्म बनवून त्याच्या ऐतिहासिक स्वरूपाचा अगदीं लोप करण्यांत आला. येणेंप्रमाणें प्रथम कृष्णानें स्थापलेला शिव-भागवत नंतर जैन व बौद्ध भागतव आणि नंतर ह्या सर्वांना तोंड देण्यासाठीं ब्राह्मणांच्या वर्चस्वाखालीं निघालेला विष्णु-भागवत असें ह्या भागवत धर्माच्या विकासाचे टप्पे स्पष्ट दिसत आहेत. आतां शेवटीं भगवद्गीतेचें थोडक्यांत दिग्दर्शन करून हें लांबलेलें दुसरें व्याख्यान समाप्त करूं.

शेतकरी व सरकार

ह्या कामीं तुम्ही आतां सरकारच्या मदतीची मुळींच अपेक्षा करूं नका, इतकेंच नव्हे तर तुमच्या संघटनेला सरकार आणि नोकरशाही संधि मिळेल तेथें कसून विरोधच करीत राहिल हें तुम्ही गृहित धरून चालाल तरच बरें. परवां दिल्लीच्या मध्यवर्ति कायदेमंडळांत काय घडून आलें ! तुमच्या हलाखीची नुसती चौकशी करण्याचा ठरावहि नोकरशाहिनें पालथा घातला ! लॉर्ड आयर्विनसारखा सज्जन व्हाइसरॉय पुनः मिळणें दुरापास्त आहे ! येतांना त्यानें तुमच्या कल्याणाचा चंग बांधला असल्याबद्दल बहाणा केला. स्वतः त्याचीच आतां नामुष्की चालली आहे, मग त्याच्या बहाण्याची काय कथा ? हें असेंच होणार. परकीय सरकारनें तुम्हांला काय म्हणून भ्यावें ? आणि भ्याल्याशिवाय कोणत्याहि सरकारनें कधीं कांहींच दिलें नाहीं, व देणार नाहीं. परकीय सरकारापेक्षां आमच्या संस्थानांतील स्वकीय सरकारांनीं तर अधिकच ताळ सोडला आहे. हे संस्थानिक पुनः आपलीच तुंबडी भरण्यासाठीं ह्या परकीय सरकारास शरण जात आहेत ! सुधारणेसाठीं नाणावलेलें म्हैसूरचें संस्थान, तेथील राजा अगदीं सच्छील ! महाराज कैलास पर्वताची यात्रा करून परत येतात न येतात तोंच, त्यांची राजधानी जें बंगलूर शहर त्यालगतच्याच खेड्यांत काय प्रकार घडला ? उपासमाराच्या वेदना सहन न होऊन एका शेतक-यानें आपल्या बायकोचा व दोन मुलांचा जीव घेऊन स्वतः पण आत्महत्या केली व चौघेहि ख-या कैलासाला गेले !  पण तेथें तरी दाद लागेल काय ? अशी हलाखी किंबहुना त्याहिपेक्षां जास्तच हिंदुस्थानांत सर्वत्र आहे.

शेतकरी आणि भांडवलदार

पण खरें पाहतां परकीयांना शेतक-यांनीं आपले हितशत्रु काय म्हणून म्हणावें ? शेतक-यांचा हितशत्रु त्यांच्या शेजारीं त्यांच्या दाराशींच उभा आहे. तो खेड्यांतला जमीनदार असो किंवा शहरांतला गिरणीवाला असो, सावकाराच्या रूपानें शेतक-यांशीं झगडत आहे ! आणि उलट त्यालाच सरकार आणि संस्थानिकांचें लष्कर व पोलीस मिंधे झाले आहेत ! शेतक-यांनीं जी संघटना करावी अशी मी ओरड करीत आहे ती सरकारविरुद्ध नव्हे, तर ह्या दाराशीं भिडलेल्या हितशत्रूविरुद्धच होय. या कामगारांनीं जी जगभर स्वसंरक्षणासाठीं संघटना चालविली आहे ती सरकारविरुद्ध नव्हे. शेतकरी झाला तरी तो श्रमजीवी कामगारच ना ? त्यांच्या तोंडांतील घास जर कोणी अगोदर ओढून घेत असेल तर तो भांडवलदार. सरकार ह्या भांडवलदाराच्याहि तोंडांतून घास काढून घेत असेल तर तें त्या भांडवलदाराचें पाहणें आहे. तुम्ही तुमच्यापुरतें पाहा. मी बोरगांवास वाळवें तालुक्याच्या शेतक-यांस जें बजावलें तेंच तुम्हासहि पुनः बजावित आहें. तें हें कीं तुम्ही आपली स्वतःची संघटना करा; इतकेंच नव्हे, तर शहरांतील कामगारांच्या संघटनेशीं खांद्याला खांदा लावून मिळून संघटना करा. शहरांतल्या व खेड्यांतल्या श्रमजीवी लोकांमध्यें पुढें कदाचित परस्पर कलागती लावून देण्याचा प्रयत्न तुम्हां दोघांचे समानशत्रु कशावरून करणार नाहींत ? म्हणून अगोदरच सावध राहून ही जोडघटना साधणें अत्यावश्यक नाहीं काय ?

शेतकरी आणि काँग्रेस

काँग्रेस जोंपर्यंत महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल वगैरेसारख्यांच्या मुठींत आहे तोंपर्यंत तरी, ती तुमच्या बाजूस राहील असा मला भरंवसा आहे. म्हणून तुम्हीहि तिला आपला पाठिंबा सरळ मनानें व सढळ हातानें द्याच. पण तुमच्यानें काँग्रेसला काय मदत होणार ? काँग्रेस तर सुशिक्षितांची आणि तुम्ही अक्षरशत्रु. काँग्रेस स्वतः श्रीमंतांच्या हातीं गेली आहे; आणि जाणें साहजिकच आहे. तुम्ही तर दरिद्री. मला एकदां वाटत होतें कीं, ही सारी काँग्रेसची चळवळ शेतक-यांनींच काबीज करावी. पण हल्लींच्या स्थितींतील हिंदी शेतक-यांनीं काँग्रेस काबीज करणें जवळ जवळ ब्रिटिश राज्य काबीज करण्याइतकेंच अशक्य नाहीं काय ? काँग्रेस जोंपर्यंत अनुकूलच आहे तोंपर्यंत तुम्हीहि तिच्या उलट जाण्याचें कारण काय ? आज काँग्रेसनेंहि तुमच्या संघटनेचें प्रत्यक्ष कार्य आपल्या शिरावर घेतलें नाहीं. याचें कारण काँग्रेसची तशी इच्छा नाहीं असें मुळींच नसून प्रस्तुतच्या हातघाईच्या लढाईंत तिला तशी वेळ व सवडच नाहीं. म्हणून नुसत्या आशीर्वादावरच तुमची ती प्रामाणिकपणें समजूत करीत आहे. तुम्हीहि प्रामाणिकपणें तिचें हित चिंता, - तिच्याशीं प्रतारणा करण्यांत तुमचें तिळमात्र हित नाहीं. पण मला सांगावयाची मुद्द्याची गोष्ट ती हीच कीं, तुम्ही ह्यापुढें कोणावरहि – प्रत्यक्ष काँग्रेसवरहि, अवलंबून राहूं नका. हें सांगण्यांत मी काँग्रेसचा अपमान करीत नसून, केवळ तुम्हांला सावध करीत आहे. काँग्रेसचें कार्य बहुतांशीं आणि आतां तर सर्वांशीं राजकारणाचें आहे. मी तुम्हांला स्पष्ट बजावीत आहे कीं, तुमच्यापुढचें कार्य मुख्यतः राजकारणाचें नसून तें अर्थकारणाचें किंवा सामाजिक स्वरूपाचें आहे, हें मी स्वतः राजकारणाला भिऊन किंवा कोणाची भीड ठेवून सांगत आहे असा गैरसमज होऊं देऊं नका. उलट, मला असें उघड दिसत आहे कीं, शेतक-यांना तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यांतच परकीय सरकार काय किंवा स्वकीय सावकार काय, नोकरशाही काय किंवा भावी सनदशीर स्वराज्य काय, कोणत्याहि मानवी सत्तेला वेसण घालण्याचें सामर्थ्य आहे, हें खरें नव्हे काय ? आणि हें स्वातंत्र्य, शेतकरी बंधूंनो, तुमच्या हातीं आयतेंच खाऊच्या पुड्याप्रमाणें कोठून तरी आणून देण्याचें सामर्थ्य आजच्या काँग्रेसमध्येंहि नाहीं; इतरांना तर तशी इच्छाच नाहीं. मग आतां तुम्ही तुमचा स्वार्थ सुधारणें आवश्यक नाहीं काय ?
काँग्रेसविषयी आणखी एक गोष्ट निर्भींडपणानें मला येथें सांगणें जरूर आहे. काँग्रेस म्हणजे सा-या देशाच्या म्हणजे त्यांतील सर्व वर्गांच्या कल्याणासाठीं विचार करणारी व त्या विचाराची अंमलबजावणारी संस्था आहे. थोडक्यांत सांगावयाचें तर ती आमची भावी पार्लमेंट आहे. पण अशी कोणती पार्लमेंट आजपर्यंत जगाच्या इतिहासांत झाली आहे कीं, जिनें आपल्या कक्षेंतल्या सर्वच वर्गांचें हित सारख्या प्रमाणांत साधलें आहे ? ही समदृष्टि मनुष्यमात्राच्या व्यवहारांत तरी जवळ जवळ अशक्य आहे. सर्व पार्लमेंटमधली राणी जी हल्लींची ब्रिटिश पार्लमेंट तिलादेखील आजवर जें साधलें नाहीं, तें आमच्या भावी पार्लमेंटला साधेल अशी अवास्तव आत्मस्तुति करणें हा माझा धर्म नाहीं. शेतकरी हा राष्ट्राचा एक विशिष्ट अर्थात सर्वांचा पोशिंदा म्हणून सर्वांत अत्यंत महत्त्वाचा व संख्येनें मोठा वर्ग आहे हें खरें. तथापि, इतर अल्पसंख्याक व परपुष्ट वर्गांइतकें वजन शेतक-यांचें आजवर कोणत्याच पार्लमेंटवर पडलें नाहीं. मग अनेकांच्या वजनाखालीं सहज दडपून जाणा-या आमच्या राष्ट्रीय सभेवर, शेतकरी बंधूंनो, तुमचें काय म्हणून वजन पडावें ? तरी काँग्रेसला तुमची कळकळ वाटते ही गोष्ट निःसंशय खरी आहे. पण ती कळकळ, पुढें ह्या देशांत भिन्न भिन्न वर्गांत स्पर्धा किंबहुना वैर माजल्यावर टिकेल, किंबहुना टिकली तरी तुम्हांला खरें आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णय आयतेंच आणून देण्याइतकी परिणामकारी ठरेल असें समजणें म्हणजे निव्वळ दुधखुळेपणाचें दिसतें. तूर्त महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर सत्पुरुषाच्या हातीं काँग्रेसचे सर्वाधिकार आहेत. हल्लींच्या लष्करी आणीबाणीच्या अवस्थेंत असें होणेंच इष्ट व जरूर आहे. पण अशा सर्वाधिकारी थोर पुरुषाला झालें तरी सर्वच पुढारलेल्या व मागासलेल्या लहानथोर वर्गांचें हित हांकेसरशीं साधणें शक्य आहे काय ?

  1. शेतक-यांचा स्वयंनिर्णय
  2. शीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश
  3. शीख धर्म
  4. शिव-भागवत
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58
  • 59
  • 60
Page 56 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी