1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

महाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला?

श्रीमंत जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट हा एक असाधारण महात्मा महाराष्ट्रांत अव्वल इंग्रेजींत होऊन गेला, पण त्याला महाराष्ट्र आज जवळ जवळ विसरून गेला आहे. असें कां झालें हाच एक विशिष्ट विषय प्रस्तुत लेखाचा आहे.

ह्या विषयाचे दोन भाग पडतात. पहिला प्रश्न असा आहे कीं, नाना संस्मरणीय पुरुष मुळीं होते कीं नव्हते? मुळींच संस्मरणीय नसल्यास त्याला महाराष्ट्र विसरला काय? हा दुसरा भाग अथवा प्रश्नच उद्भवत नाहीं. कारण पुरुष संस्मरणीय नसेल तर देशानें त्याला विसरणें हेंच साहजिक आहे. पहिल्या भागांत पहिल्याच प्रश्नाचा विचार करूं.

भाग १ ला
नाना शंकरशेट हे शंकरशेट वाकलशेट ह्यांचे पुत्र इ. स. १८०३ सालीं मुंबईस जन्मले त्या वेळीं पेशवाई अद्यापि बुडाली नव्हती. नाना फडणीस इ. स. १८०० सालीं दिवंगत झाले होते. मराठ्यांशीं इंग्रजांचें दुसरें युद्ध होऊन लवकर सुरजी अंजनगांवचा तह इ. स. १८०३ सालीं झाला; त्याच वेळीं मराठेशाही नसली तरी पेशवाई जवळ जवळ बुडण्याच्या पंथास लागली. इंग्रजांचा हात महाराष्ट्रांत कायमचाच शिरकूं लागला. अशा संधीस एक नाना (फडणीस) अस्तंगत होऊन दुसरा नाना (शंकरशेट) जन्मला. पेशवाई इ. स. १८१८ ला पार बुडाली. इ. स. १८२२ सालीं ह्या दुस-या नानाचे वडील श्रीमंत शंकरशेट मुंबईस वारले आणि त्यांच्या अवाढव्य इस्टेटीची पूर्ण मालकी केवळ १८ वर्षांचें कोवळें पोर नाना शंकरशेटकडे आली ! काय योगायोग !! कारण ह्या कोवळ्या तरुणानें एकदम उगवत्या इंग्रज प्रभूशीं पुढें ४३ वर्षें मोठ्या बाणेदारपणानें जें असामान्य सहकार्य केलें त्याची योग्यता आजकालच्या महात्मा गांधींच्या असहकार्याच्या खालोखाल एक महत्त्वाचा भाग म्हणून मुंबई इलाख्याच्या इतिहासांत चमकेल ह्यांत तिळमात्र शंकानाहीं. मग हा थोर पुरुषश्रेष्ठ संस्मरणीय नव्हे असें कोण म्हणेल? तरी आजच्या महाराष्ट्रांतील किती तरुण - मग ते कितीहि पढिक पदवीधर असोत - नानांची योग्यता खरोखरी किती आहे हें नानांच्या चरित्राचें महत्त्व खालील गोष्टीवरून सिद्ध होतें.
१. नानांचें घराणें गर्भश्रीमंत व्यापारी पेशाचें होतें. त्यांचे खापरपणजे नारायणशेट ह्यांचा काठेवाडांतील पोरबंदर येथें मोत्यें व इतर जडजवाहिराचा व्यापार होता. पणजे माणिकशेट ह्याकडे ठाणें जिल्ह्यांतील तालुके मुरबाड ह्या गांवीं पोतद्दारी होती. हाच गांव ह्या इतिहासप्रसिद्ध घराण्याचा मूळ वतनाचा होता. पुढें नानांचे आजे बाबुलशेट ह्यांच्या कारकीर्दींत मुंबईजवळील कल्याण प्रांत हा पोर्तुगीजांच्या ताब्यांत असल्यामुळें ह्या सर्व प्रांतांत पोर्तुगीजांची देशबुडवीच नव्हे तर हिंदुधर्मांला रसातळास नेऊ पाहणारी कारवाई चालली होती. अशा धामधुमींत वसईच्या खाडीच्या तोंडाशीं असलेलें घोडबंदर नांवाचें मा-याचें बंदर आपल्या घराण्याच्या व्यापराचें केंद्र म्हणून निवडून काढून आपलें बस्तान थाटलें ! इतकेंच नव्हे कालांतरानें मुंबईबेट इंग्रजांकडे जाऊन तेथील व्यापारपेठ वाढूं लागली म्हणून लगेच बाबुलशेटीनें तेथेंहि आपली एक पेढी उघडली.
२. बाबुलशेटीना शंकरशेट पुत्र झाले. ते तर बापसे बेटा सवाई निघाले. त्यांनीं आपल्या बापाच्या जुन्या व्यापाराला नवीन वळण लाविलें. त्यासाठीं शंकरशेटला घरीं खावयास कांहीं कमी नसतांहि त्यांनीं मुंबईस एका युरोपियन कंपनींत नोकरी धरली. हेतु हा कीं नुसतें आपल्याला इंग्रेजी भाषा यावी इतकेंच नव्हे तर इंग्रजांची व्यापारी मोड हस्तगत व्हावी. बाबुलशेटींना प्रथम प्रथम हा भ्रष्टाकार पसंत पडला नाहीं, पण लगेच जेव्हां शंकरशेटींनीं व्यापारांत चाराचे चव्वेचाळीस केले तेव्हां बाबुलशेटींनीं चिरंजिवाची पाठ थोपटली. शंकरशेटच्या अंतकाळीं “त्यांच्या खजिन्यांत सोळा लाख रुपये रोख आणि एक लाखाचें जवाहीर होतें” असें त्यांचे चरित्रकार रा. पितळे लिहितात !
३. अशा कर्तृत्ववान् वैश्याच्या पोटीं नाना हे इ. स. १८०३ सालीं रत्न निर्माण झालें. त्यांनीं वैश्य वृत्तींत तर आपल्या जनकावर सवाई शंकरशेटपणा गाजविला. इतकेंच नव्हे, तर महाराष्ट्रांतील मुत्सद्देगिरीतहि नाना फडणिसावर सवाई नानापणा गाजविला हें भावी इतिहासकारांना कबूल करावें लागेल. चार पिढ्यांचा गर्भश्रीमंतपणा भोगूनहि केवळ १८ वर्षांचें मूल असून त्या वेळचा पहिला मुंबईचा गव्हर्नर मौंट स्टुअर्ट
एल्फिन्स्टन हा महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या बाबतींत नानाची सल्लाच नव्हे तर आर्थिक मदत मागावयास येतो हीं काय लहानसहान गोष्ट? ही गोष्ट नानाचा मोठेपणाच नव्हे तर अव्वल इंग्रेजीचा पाया घालणा-या इंग्रज बहाद्दरांचा नम्रपणाहि दाखविते. त्या वेळीं हल्लींच्या चर्चिलप्रमाणें सारेच इंग्रज उर्मट असते तर इंग्रजांचे पाय येथें रोवलेच गेले नसते.
४. नाना इ. स. १८०३ सालीं जन्मले. इ. स. १८२२ सालीं बाप वारल्यावर एकदम सार्वजनिक कार्यांत अगदीं अग्रेसर म्हणून धडकूं लागले. इ. स. १८४० च्या सुमारास तर त्यांच्या भ्रूकुटीशिवाय महाराष्ट्रांतील सार्वजनिक चळवळीचें एक पानहि हालेना ! १८५७ सालच्या बंडांत नाना सामील होते अशा संशय-पिशाच्चानें इंग्रज बहाद्दराला घेरलें. पण जेव्हा मुंबईच्या पोलीस कमिशनराची बालंबाल समक्ष खात्री झाली तेव्हां पुढील गव्हर्नरांनीं मागील सर्व गव्हर्नरांप्रमाणें नानांची पुन: मर्जी संपादण्याचा क्रम सुरू केला. फार काय नानांच्या निधनानंतर तेव्हांचे मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फियर ह्यांनीं व्यक्तिशःच नव्हे तर इलाखाधिपति आणि ब्रिटिश बादशहाचा प्रतिनिधि म्हणून जीं दोन उघड दुखवट्याचीं पत्रें पाठविलीं व जीं रा. पितळे ह्यांनीं लिहिलेल्या चरित्रांत पान ३५०, ३५१ वर प्रसिद्ध झालीं आहेत, त्यावरून नानांची स्वामिनिष्ठाच नव्हे तर देशनिष्ठाहि सिद्ध होत आहे !
५. नानांचें सार्वजनिक कार्य. शिक्षणाचे बाबतींत इ. स. १८२२ सालीं बाँबे स्कूल बुक अँड स्कूल सोसायटीपासून तों शेवटीं शेवटीं हल्लींची मुंबई युनिव्हर्सिटी स्थापन होईतोंपर्यंत पुरुषांच्या व बायकांच्या, प्राथमिक, दुय्यम आणि वरिष्ठ शिक्षणांत, सर्व प्रकारें नाना होते. युक्ति, नेतृत्व आणि दानशूरपणा सारखाच गाजत राहिला. राजकारणांत :- १८२९ सालीं मुंबईचे चीफ जस्टिस सर जॉन पीटर ग्रँट ह्यांनीं हेबिएस कॉर्पस ऍक्टच्या बाबतींत हिंदी लोकांची बाजू उचलली म्हणून त्या वेळचे गव्हर्नर सर जॉन मालकम् ह्यांनीं या उदार न्यायाधिशाला राजीनामा द्यावयाला लावला म्हणून सरकारची निर्भर्त्सना करण्याकरितां जी हिंदी लोकांची मुंबईंत जाहीर सभा भरली तिचे नाना अध्यक्ष होते. इतकेंच नव्हे ज्याचा निषेध नानांनीं केला, तेच मालकमसाहेब हिंदुस्थानचे प्रत्यक्ष व्हाइसरॉय लॉर्ड बेंटिंक ह्यांच्याशीं मिळून जेव्हां हिंदुस्थानांतील सतीची दुष्ट चाल बंद करू पाहात होते, तेव्हां बंगाल्यांतील ब्राह्मणांनीं अतिशय तीव्र विरोध केला म्हणून महाराष्ट्रीयांची मदत मागण्यास लॉर्ड बेंटिंकसाहेबांना नाना शंकरशेटच्या भेटीस पुनः पुनः पाठविलें ! ह्याचेंच नांव सहकार्य-अथवा प्रतिसहकार्य ! ह्यांतच इंग्रजांचा व नानांचा मोठेपणा दिसतो. जें आजहि गांधी - आयर्विनला लवकर साधेना तें त्या वेळीं नाना - बेंटिंकला साधलें ! अनेक बिकट प्रसंगीं नानांची एकामागून एक तत्कालीन सर्वच गव्हर्नरांनीं भेट घ्यावी व द्यावी असा प्रकार पडद्याआड व पडद्यापुढें सारखा नाना मृत्युशय्येवर पडेपर्यंत चालूं होता. ज्यूरीचा व पेटी सेशनचा हक्क, स्मॉल कॉज कोर्टमध्येंहि बॅरिस्टरच्या मदतीवांचून कामे चालत असत त्याऐवजीं साध्या वकिलाकडून काम चालणें, वगैरे गोष्टीपासून प्रत्यक्ष कायदे-मंडळांत एतद्देशियांचा शिरकाव मिळवीपर्यंत सर्व हक्क नानांना पदोपदीं साम-दाम-दंड वगैरे निरनिराळ्या उपायांनीं संपादन करावे लागले ! त्या वेळच्या सर्वच संस्थांचे तेच बहुतेक संस्थापक होते. इतकेंच नव्हे तर बहुतेकांचे ते अध्यक्ष आणि सर्वांचे निदान आश्रयदाते तर होतेच ! फार तर काय मुंबई म्युनिसिपालिटी, मुंबई विश्वविद्यालय हींच नव्हत, तर बॅक बेची भर घालण्यासाठीं निघालेली व्यपारी चळवळ असो किंवा प्रत्यक्ष जी. आय. पी. रेल्वेसारख्या प्रचंड कंपनीची स्थापना असो, त्यांच्या प्रत्यक्ष मसलतीशिवाय व मदतीशिवाय कोणतेंहि कार्य होऊंच नये असा त्या वेळी नानांचा व्याप असे ! आणि या डोईजड झालेल्या रेल्वेचे नाना तर एक डायरेक्टर असत. आपलें वजन आहे कीं नाहीं हें पाहण्यासाठीं नाना केव्हां केव्हां आपण प्रवास करावयाचा असल्यास स्टेशनावर पांच पांच मिनिटें मुद्दाम उशीर करून जात, ते आल्याशिवाय त्यांचा फर्स्टक्लास रिझर्व्हड् डबा जागचा हालत नसे अशी आख्यायिका आहे !
असो. अशा तपशिलाच्या गोष्टी लिहीत बसल्यास लेखाचा विस्तार आवांक्याबाहेर जाईल, म्हणून केवळ स्थूलमानानें व संक्षेपानेंच नानांच्या सार्वजनिक चरित्राकडे पाहणें भाग आहे. येणेंप्रमाणें इ. स. १८२२ पासून इ. स. १८६५ पर्यंत अव्वल इंग्रेजीच्या पहिल्या दोन पिढ्या नानांच्या केवळ मुठींत गेल्या. म्हणून ह्या युगाला महाराष्ट्रांतलें नाना-युग म्हटलें तरी अतिशयोक्तीचा आरोप आम्हावर येईलसें वाटत नाहीं. ह्यापुढें रानडे, टिळक वगैरेंची युगें झाली. पण तीं त्यांच्या अगदीं नानाइतकीं मुठींत वळलीं गेलीं नाहींत. बडोद्याचे सयाजीराव, कोल्हापूरचे शाहू छत्रपति, पुण्याचे जोतिराव फुले, रानडे, गोखले, टिळक, मुंबईचे दादाभाई नवरोजी किंवा फेरोजशहा मेथा, वगैरे थोर थोर धुरीणांचीं बृहन्महाराष्ट्रांत सिंहासनें आणि प्रभावळ्या होऊन गेल्या. परंतु आधुनिक महाराष्ट्राचा पितामह ही लौकिक संज्ञा जर कोणास देणें योग्य असेल तर ती, गुजराथ आणि महाराष्ट्राच्या दोन्ही देशांना आवरून धरणारी जी मध्यवर्ती मुंबई नगरी आहे तिच्यांत जन्मून अंतर्धान पावणा-या ह्या आमच्या नाना शंकरशेटजींनाच देणें प्राप्त आहे, असें आमचें मत विचाराअंतीं बनले आहे.
सार्वजनिक चरित्राप्रमाणेंच नानांचें खासगी आणि धार्मिक चरित्रहि उजळ आणि भाग्यवान् होतें. एक विशेष गोष्ट आणि त्याहूनहि विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या सार्वजनिक अथवा खाजगी चारीत्र्याला आपल्या विशिष्ट स्वज्ञाति अभिमानाची दुर्गंधी कधींच सुटली नाहीं, हें भावी इतिहासकारांना अवश्य ध्यानांत घेण्यासारखें आहे.
बंगालचे राजा राममोहन राय ह्यांना आधुनिक हिंदुस्थानचे पितामह समजण्यांत येतें. इसवी सन १८२२ पासून इसवी सन १८३१ पर्यंत ( ह्या सालीं राममोहन ब्रिस्टल येथें वारले) नऊ वर्षें नाना त्यांचे सार्वजनिक चारित्र्यांत समकालिन होते. इतकेंच नव्हे तर सतीची चाल बंद करण्यांत नाना राममोहनांचे सहकारी होते. राममोहनांचे चारित्र्य अखिल हिंदुस्थानालाच नव्हे तर जगाच्या रंगभूमीवर चमकणारें होतें. अगाध विद्वत्ता आणि ऋषितुल्य धर्मप्रवर्तकत्व ही दैवी संपत्ति राममोहनांच्या वांट्याला आल्यामुळें राममोहनाकडे अर्थात् आधुनिक हिंदुस्थानचें पितामहत्व जातें खरें. तरी महाराष्ट्रापुरतेंच पाहावयाचें झाल्यास नानाला ( धार्मिंक बाबीचा विचार वगळून) महाराष्ट्राचा राजा राममोहन राय म्हणावयास हरकत कोणती? असो. नाना शंकरशेट हे एक असामान्य पुरुषश्रेष्ठ होते म्हणून ते चिरस्मरणीय आहेत हें सिद्ध झालें. येथें आमच्या लेखाचा पहिला भाग समाप्त झाला.
[ या लेखाचा दुसरा भाग लिहिला गेला नाहीं ]

महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी

गेल्या तीन शतकांत आमच्या ह्या हतभागी हिंदुस्थानांत दोन लोकोत्तर पुरुष निर्माण झाले, ह्यावरून जगाच्या इतिहासप्रभावळींत ठेवण्यासारखीं पुरुषरत्नें पैदा करण्याची आमच्या देशाची शक्ति नष्ट झाली नाहीं, हें आम्हीं निरभिमानपणें व केवळ आध्यात्मिक दृष्टीनेंहि म्हणूं शकतों. हीं रत्नें म्हणजे पुण्यश्लोक श्राशिवाजीमहाराज आणि पूज्यपादारविंद महात्मा गांधीजी हींच होत ! ह्या दोघांच्या चरित्रांची तुलना, आम्हीं त्यांचे व्यक्तिविषयक गोडवे म्हणून करीत नाहीं तर त्यांच्या मननीय चरित्रांत इतिहासाची पुनरावृत्ति तर झालेली दिसत आहेच पण मानवी समाजाच्या इतिहासांत विशेषतः राजकारणांत अलीकडे आशाजनक युगांतर होऊं घातलें आहे, आणि त्यांत आमचा जुनापुराणा देश पुढाकार घेत आहे अशा श्रद्धाळु समजुतीनेंच आम्हीं ही तुलना करण्याचें धाडस करीत आहों. ह्यांत कांहीं दोष घडत असेल तर त्याबद्दल आम्ही पूर्ण जबाबदार आहों. नुकतेच प्रिन्सिपॉल गो. चि. भाटे ह्यांनीं श्रीशिवाजी आणि नेपोलियन यांच्यामध्यें ‘नवयुग’ मासिकांत ओझरती तुलना केली आहे; पण तिच्यांत आम्हांला विशेष आध्यात्मिक दृष्टि दिसली नाहीं. असें म्हणण्यांत रा. भाटे यांच्या उलट कसला तरी आक्षेप घेण्याचा आमचा उद्देश मुळींच नाहीं. मात्र दोन दुभाषी चरित्रांसंबंधीं आपला अभिप्राय व्यक्त करतांना त्यांतून श्रीशिवाजीचें चरित्र वाजवीपेक्षां जास्त उठावदार वठविण्यांत आलें आहे, असा जो ध्वनि रा. भाटे यांनीं काढला आहे तो सर्वसंमत होईलच हें कांहीं सांगवत नाहीं. प्रो. जदुनाथ सरकार मोंगली ऐतिहासिक उपकरणांना बळी पडले ही जशी शंका रा. भाटे यांना आली तसेंच स्वतः भाटेसाहेबहि आपल्याच जड तर्कवादाला बळी पडले नसतील कशावरून ? अशी शंका कोणास आल्यास ते रागावणार नाहींत अशी उमेद आहे. आम्ही स्वतः श्रीशिवाजीचे किंवा गांधीजीचे पूजक मुळींच नाहीं. अवतारवादापासून रा. भाटे ह्यांच्यापेक्षांही चार पावलें जास्त दूर आम्ही आहों. तथापि आज जी आम्हीं अल्पमतीनें तुलना करीत आहों ती केवळ टिकात्मक नसून ज्यांना आम्हीं थोर समजतों त्यांच्याच नव्हे तर ख-या मानवी थोरपणासंबंधीं श्रद्धेनेंच आम्हीं करीत आहों हेंहि आम्हांस कबूल करणें भाग आहे. नेपोलियन जगज्जेता होता म्हणून श्रीशिवाजी हा त्याच्यासारखा जगज्जेता होता असें म्हणण्यांत आम्ही महाराजाला नीट ओळखलें असें आम्हांला तरी कधींच वाटणार नाहीं. ज्या मनुष्यानें स्वतःला जिंकलें नाहीं, त्यानें आणखी दहा जगें जिंकलीं तरी त्याचें आम्हांला काय ? असल्या बहिर्मुख जगज्जेत्यांनीं मानवी इतिहासाला आजपर्यंत जें काळें फासलें तेवढेंच पुरें आहे. त्याची बडेजावी करणें ही अत्यंत घातुक मूर्तिपूजा ! प्रश्न हा आहे कीं श्रीशिवाजीनें स्वतः आपल्यास जिंकिलें होतें कीं नाहीं ? आम्हांला वाटतें त्यांच्यांत आत्मजय होता. म्हणूनच त्यांना इतर जय मिळाले इतकेंच नव्हे तर रा. भाटे ह्यांनींच सिद्ध केल्याप्रमाणें आज परकीय किंबहुना स्वकीय इतिहासकारावरहि महाराज दिग्विजय मिळवूं लागले आहेत, म्हणूनच तर आम्हीं त्यांना पुण्यश्लोक म्हटलें आहे ! महात्मा गांधी सत्याग्रही व संयमी आहेत पण त्यांना आपल्या कामगिरींत अद्यापि यश यावयाचें आहे. श्रीशिवाजीला तें यश येऊन आज अडीचशें वर्षें झालीं. (त्यांच्या मागील दिवट्यांना तें घालवून आज शंभर वर्षें झालीं, ह्याबद्दल रा. भाटेहि हळहळत आहेत हा भाग वेगळा.)
महात्मा गांधी परकीयांचे किंबहुना कोणाचेहि द्वेष्टे नाहींत. पण महाराजहि नव्हते. त्यांना त्या वेळची राज्यपद्धति उलथून पाडावयाची होती, ती कोणाची भीड न ठेवतां, प्रत्यक्ष आपल्या गुरूची किंवा बापाची तमा न ठेवतां त्यांनीं पाडीली. तेव्हां कोठें भारंभार दक्षिणा घेऊन देवब्राह्मणांनीं त्यांना फुकाचे आशीर्वाद दिले ! (कांहींतर अद्यापि द्यावयाला तयार नाहींत हाहि भाग वेगळाच !) पुष्कळ वेळां मुसलमानी दुश्मन त्यांचे हातीं लागले असतां त्यांना जिवानिशीं सोडलें, व आपल्या कार्याला लावलें. उलटपक्षीं आपले जातिबंधू म्हणविणा-या हरामखोर धेंडांना तार्किकांची तमा न धरतां चिरून काढलें, इतकेंच नव्हें तर स्वीकृत सत्कृत्याला जेव्हां आपल्या स्वतःच्या पोटचा गोळा युवराज संभाजी आड जाऊं लागला, तेव्हां त्यालाहि दूर कारागृहांत ठेवलें. तो त्यांच्या मरणापर्यंत तेथेंच खितपत होता. पण नेपोलियननें इजिप्तमध्यें काय केलें ? तर पांच हजार मुसलमान कैदी शरण आले तेव्हां त्यांना पोसावे कोणी म्हणून त्यांची अक्षरशः कत्तल केली ! पूर्व ती पूर्वच व पश्चिम ता पश्चिमच !! तुलना करितांना घाई होऊं नये. उपमेय समानधर्मी असणें आवश्यक असतें. नाहीं तर लांडगा आणि शस्त्रवैद्य ह्यांमध्यें तुलना होऊन जावयाची एकादे वेळीं ! कोणी बाळ विद्यार्थी शंका सहज घेतील कीं गांधीजी अनत्याचारी आणि शिवाजीची तलवार तर सदाहि रक्तानें थबथबलेली. येथें साधर्म्य कोठें राहिलें ? पण महाराज हे दंडधारी क्षत्रिय होते. केवळ असहकारी चळवळे नव्हते. गनीम नुसत्या शब्दांनीं परावृत्त होत असता, तर दंड हा शब्द कशानेंहि निर्माण झाला नसता. अत्याचार हा नैतिक असतो, शारीरिक नसतो, हें तत्त्व आतां सहानुमतिहीन परकीय इतिहासकारांनींहि महाराजांच्या बाबतींत लागू केलें आहे. स्वकीय धूर्तांनीं महाराजांची तलवार ब्राह्मणांना लागली असेल अशी शंका काढून त्यांना प्रायश्चित्त दिलें व पैसा उकळला, त्याला आमचा काय इलाज ? गांधीजींचा अनत्याचार व महाराजांचा गीताप्रणीत क्षात्रधर्म ह्यांतील तादात्म्य ज्या बालकांना अद्यापि समजलें नसेल अशांसाठीं आजची तुलना मुळींच नाहीं. कोणी विचारतील, काय हो, गांधीजींनीं हिमालयाएवढ्या चुका केल्या, नेहमीं नामुष्कीची हार खाल्ली, जहाल-मवाळांचा छळ सोसला आणि आतां तर गुन्हेगाराप्रमाणें तुरुंगांत पडले. उलट श्रीशिवाजींनीं जें म्हटलें तें करून दाखविलें व शेवटीं त्यांच्या उलट असलेल्या महाराष्ट्रीय ब्राह्मणांनीं देखील त्यांच्यावर स्वराज्याचा अभिषेक केला, हें काय, कशास कांहीं पत्ताच नाहीं ना ! त्याला उत्तर इतकेंच कीं, श्रीशिवाजी होऊन गेले व महात्मा गांधीजींना होऊं घातलें आहे!
येथवर जी आम्हीं तुलना केली त्यावरून महाराज आणि महात्माजी ह्यांच्यामध्यें स्वतःचे कित्येक विशेष गुण नव्हते व तज्जन्य भिन्नता नव्हती असें आमचें मुळींच तात्पर्य नाहीं; उलट हें उघड आहे कीं, जुन्या संस्कृतींतले महाराज हे पुण्यश्लोक नृपावळींतले नृपवर होते, तर महात्माजी हे नव्या संस्कृतींतले प्रजापक्षाचे अखिल जगाला भूषणभूत अद्वितीय पुढारी आहेत हें सत्य महात्माजीनां शिक्षा ठोठावतांना न्यायाधिशालाहि कबूल करावें लागलें. ह्यावरून ब्रिटिश न्यायदेवता पूर्ण आंधळी नसून तिलाहि दिसत असावें अशी शंका घेण्यास जागा आहे. ह्या दोन विभूतींमध्यें संस्कृतिभेदान्वयें पुष्कळच भिन्नता पाहणारांनाहि दिसेल. उदाहरणार्थ, एक वृत्तीनें क्षत्रिय तर दुसरा बनिया; एक स्वराज्यवादी तर दुसरा प्रजावादी; एक राजकार्यधुरंधर तर दुसरा वाङ्मय विभूषित; एक पूर्व युगाच्या मावळतीवर तळपणारा सूर्य तर दुसरा नवयुगाच्या उगवतीवर डोकावणारा अरुण. पण असे उपाधिभेद कितीहि दिसले तरी ज्या ख-या विभूति असतात त्या संस्कृतजन्य गुणदोषांच्या ढगांआड फार वेळ लपून राहात नाहींत आणि इतिहासज्ञांच्या दुर्बिणीच्या शक्तीला असले तत्काळ विरघळणारे ढगहि अडथळा मुळींच करूं शकत नाहींत.
कोणी आमच्यावर विभूतिपूजेच्या अतिरेकाचा आक्षेप अणतील तर आम्हीं हेंहि येथें नमूद करीत आहों कीं विभूति झाले तरी हे दोघेहि मानवकोटींतलेच आहेत. ह्यांच्या महात्म्याप्रमाणेंच ह्यांचें लाघवहि इतिहासज्ञांच्या दुर्बिणीच्या आंवाक्याबाहेरची गोष्ट नाहीं. महाराजांनीं दिल्लीहून परत आल्यावर जो राज्याभिषेकाचा समारंभ केला, क्षुद्र दैवतें आणि विप्रवर्गाची आराधना केली किंबहुना आपल्या कार्यारंभीं आपल्या अंगांत देवी येते असा इतरांचा अथवा स्वतःचाहि भास करून दिला किंवा घेतला, ह्या व अशा इतर बाबी महाराजांच्या लोकसंग्रही लाघवाच्याच होत. त्यांना जें अपूर्व यश लाभलें तें लाभलें नसतें तर ह्याच क्षुद्र बाबी त्यांना जाचकहि झाल्या असत्या. कांहीं अंशीं त्या यशाला ह्या कारणीभूतहि झाल्या असतील. नाहीं कोणीं म्हणावें ? पण त्या भूषणावह किंवा आवश्यक होत्या असें मत सर्वसंमत होणार नाहीं. इतर पक्षीं गांधीजींना अहमदाबादच्या काँग्रेसचा सर्वाधिकारी कसा नडला, त्यांचे वर्णाश्रमधर्मासंबंधीं विचार किती पारदर्शक होते, त्यांचा वेळीं अवेळीं जो बालिश जयजयकार झाला त्यानें त्यांच्या मनाला त्रास आणि कार्याला बाधा कशी झाली वगैरे गोष्टी किंचित खोल पाहणाराला तेव्हांच दिसण्यासारख्या आहेत. महात्म्यांचें हें लाघव कोंदणाप्रमाणें कित्येक वेळां शोभून जातें. तरी ब-याच वेळां बाधकहि होतें. त्याच्या वेदना कशा असतात हें महात्माच जाणोत; आमच्यासारख्यांनीं त्याची विचक्षणा काय करावी ?
असो. आम्हांला ह्या तुलनेनें इतिहासाची पुनरावृत्ति कशी होते तें दाखवावयाची होती. शिवाय युगांतरहि कसें होत आहे हें सांगावयाचें होतें. पण हा विषय चालू समाजविकासाचा व राजकारण परिणतीचा आहे. तो भावनामय आणि अननुभूत असल्यामुळें त्याची आगाऊ चर्चा कदाचित अनाठायींच होईल. सर्व राष्ट्राला जितेंद्रिय करणें, त्याच्याकरवीं अनत्याचारी असहकार्य ह्या दोन निषेधांनीं दूषित झालेल्या विधींचा उपक्रम यशस्वी करून दाखविणें हें चालू नवयुगाचें मुख्य लक्षण आहे खरें. पण त्याचा श्रीशिवाजीमहाराजांच्या चरित्राशीं तादृश संबंध नाहीं. तुरुंगांत असोत किंवा राष्ट्रीय सभेंत असोत, महात्मा गांधी तो विधि यशस्वी करून दाखवितील अशी तूर्त आमची श्रद्धा आहे.

महानुभाव पंथ

बाराव्या शतकाच्या सुमारास गुजराथेंत त्रिमल्लदेव नांवाचा राजा होता. त्याच्या पोटीं पुत्र नसल्यानें त्यानें आपलें राज्य विशालदेव नांवाच्या ब्राह्मण प्रधानाला दिलें. श्रीदत्तात्रेयाच्या प्रसादानें विशालदेवाला पुत्र झाला. त्याचें नांव हरपाळ. तरुपणपणीं जुगाराचा नाद लागून ह्यानें राज्य घालविलें, आणि देशोधडीस लागला. फिरतां फिरतां व-हाडांत ऋद्धिपूर येथें इ. स. ११८५ सालीं गोविंद प्रभु नांवाच्या एका विद्वान् आणि विरक्त ब्राह्मणाचा अनुग्रह मिळाला. त्यानें त्याचें नांव हरपाल बदलून श्रीचक्रधर असें नवीन नांव ठेविलें. ह्यापुढें ह्यानें दोनदा विवाह करून पुन: विरक्त होऊन तीर्थयात्रा करीत भटकूं लागला; अखेरीस इ. स. १२६३ सालीं ह्यानें संन्यास घेतला. शिष्यशाखा स्थापन केली, तिचाच पुढें महानुभाव पंथांत विकास झाला. वि. ल. भावे ह्यांनीं आपल्या “महाराष्ट्र सारस्वत” ह्या ग्रंथांत ह्या पंथाचें सहानुभूतिपूर्वक वर्णन केलें आहे. मराठी भाषेची आद्य ग्रंथरचना ह्याच पंथानें करून मराठीच्या जनकत्वाचें श्रेय संपादिलें आहे. ह्यांचा प्रचंड ग्रंथसमूह प्रसिद्ध होईल, तेव्हां ह्याचा आश्चर्यकारक इतिहासच नव्हे, तर मराठी भाषेची पूर्वपीठिकाहि उजेडांत येईल.

महानुभाव ग्रंथांत केवळ कृष्णाचीच उपासना आहे. पण मूर्तिपूजा नाहीं. जातिभेद मुळींच नाहीं. गुरूंचें महत्त्व विशेष आहे. येणेंप्रमाणें लिंगायत पंथाशीं ह्याचें विशेष साम्य आहे. बौद्धांच्या मागोमाग निर्माण झालेल्या ह्या दोन धर्मांतून जीं हीं प्रगतीचीं आणि समतेचीं लक्षणें प्रथम प्रथम रूढ होतीं तीं पुढें ब्राह्मणी धर्माच्या सहवासानें आणि छळानें शिथिल पडलीं. महानुभाव पंथाविषयीं इतर हिंदूंत मोठी तेढ आणि कठोर द्वेषभाव असण्याचें कारण फार गूढ आहे. हा पंथ जातिभेद न मानतां महारमांगांमध्येंहि आपला प्रसार करितो, हें एक ह्या तेढीचें कारण असावें. तरी पण ह्यांच्या धर्मांत हिंदूंना चीड किंवा किळस येण्यासारखें कांहीं नाहीं. हे दुस-या कोणत्याहि  धर्माची निंदा करीत नाहींत, किंवा त्यांच्या वाटेला मुळींच जात नाहींत. तरी हे अद्यापि फार अप्रिय आहेत आणि ह्यांनीं सर्वांत अगोदर केलेली धर्मसुधारणेची आणि विशेषत: मराठी भाषेच्या उत्पत्तीची असामान्य कामगिरी अद्यापि कोणाच्याहि गणनेंतच नाहीं, ही मोठी खेदाची आणि आश्चर्याची गोष्ट आहे.

महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)

(१) दोघेहि जन्मतः ब्राह्मणेतर होते. पण ह्या मुद्यास आतांप्रमाणें त्यांच्या काळीं महत्त्व आलें नव्हतें. दोघेहि ब्राह्मण कुळांत जन्मले असते तरी त्यांनीं आपलें कार्य तसेंच बजावलें असतें व दोघांनाहि कांहीं उदारमतवादी ब्राह्मण गृहस्थांचें साह्य होतें; इतकेंच नव्हे तर तेव्हांप्रमाणेंच हल्लींहि पुष्कळ अनुदार ब्राह्मणेतरांचा विरोधहि चालूं आहे. ह्यावरून दोघांची दृष्टि जातीच्या उपाधीपासून मुक्त असून, त्यांची कृति भावी इतिहासांत चिरकाल जागा व्यापील, ह्यांत संशय नाहीं. केशवाविषयीं तर प्रश्नच नाहीं, पण जोतीबांनींहि आपल्या “सार्वजनिक सत्यधर्म” पुस्तकांत पान १२ वर “अन्नदान” ह्या प्रकरणांत स्पष्ट म्हटलें आहे कीं, “एकंदर सर्व मानवांपैकीं जो कोणी आपल्या कुटुंबाचें पोषण करून जगाच्या कल्याणासाठीं सतत झटत आहे तो आर्य भट भिक्षुक असो अथवा अमेरिकेंतील इंडियन असो, अथवा ज्याला तुम्ही नीच मानितां असा एकादा मृतप असो तो मात्र अन्नदान घेण्यास पात्र आहे; आणि तशालाच अन्नदान केल्यानें निर्मिकास अर्पिलें जाणार आहे.”
(२) दोघेहि भ्रष्ट हिंदु धर्मावर व अन्यायी हिंदु वरिष्ठ वर्गावर रुसलेले जबरदस्त बंडखोर होते. त्यांच्यामध्यें इतर सर्व धर्मांसंबंधीं पूर्ण सहानुभूति व योग्य आदर होता; तरी त्याला बळी न पडून दोघांनींहि कधींच धर्मांतर न करतां केवळ सार्वत्रिक सत्य धर्माची ध्वजा उभारून तिच्याखालीं येण्यास सर्व धर्मियांस सारखेंच व सतत आवाहन केलें.
(३) परकीय मिशन-यांशीं जसा, तसाच ब्रिटिश सरकारशीं व नोकरशाहीशींहि दोघांचा बहाणा आदराचा पण उदात्त स्वातंत्र्याचा होता. केशवाच्या भेटीचे व सल्ल्याचे व्हाइसरॉय व गव्हर्नरहि नेहमीं भुकेलेले असत. त्यांच्या कलकत्यांतील (टाउन हॉल मध्यें होणा-या) एका वार्षिक व्याख्यानाच्या गर्दींत शिरून एक तत्कालीन गव्हर्नर साधारण माणसाप्रमाणें त्यांचें भाषण एकदां ऐकून गेले !  मुंबई सरकारनें जोतीबांचाहि एक मौल्यवान शालजोडी देऊन सत्कार केला. पण दोघांना केव्हांहि सरकारी नोकरीचा किंवा किताबाचा, किंबहुना चालू भाडोत्री राजकारणाचा मोह पडला नाहीं. दोघेहि मिशनरी व सरकारी कावे ओळखून होते.
(४) तरी आपल्या देशोद्धाराच्या कठीण संग्रामांत त्यांनीं निष्कपटी ख्रिस्ती मिशन-यांचें व उदारधि सरकारी सत्ताधा-यांचें साह्य घेण्याचें नाकारण्याचा तोरा दोघांनींहि कधीं मिरविला नाहीं.
(५) दोघेहि स्त्री-शूद्रांचे कर्ते, यशस्वी व कनवाळू कैवारी होते. ब्राह्म धर्मासारख्या उदार चळवळींत स्त्रियांचा प्रवेश केवळ केशवाच्याच कर्तृत्वामुळें प्रथम झाला. राममोहन रॉय यांनीं जरी सतीची चाल बंद केली तरी ब्रह्मोपासनेंत पुरुषांबरोबर स्त्रियांना आणून बसविण्याचें धैर्य त्याला किंवा त्याच्यामागून आलेल्या महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर ह्यालाहि झालें नाहीं. तें कार्य बंगाल्यांत केशवानें स्वतःची पत्नी खानदानी अभेद्य पडद्यांत अगदीं कोवळ्या वयांत असतांहि तिच्या माहेराची कडेकोट बंदोबस्ताची कोंडी बेगुमान आत्मविश्वासानें फोडून साधिलें आणि ब्रह्मोपासनाच नव्हे तर अखिल ब्राह्मिक जीवन सार्वत्रिक व संपूर्ण केलें. इकडे महाराष्ट्रांत तर जोतिबांनीं केशवाच्या पूर्वीं ८|१० वर्षें म्हणजे इ. स. १८५२ सालीं अस्पृश्यांच्या मुलांसाठींच नव्हे तर मुलींसाठींदेखील पहिली हिंदी शाळा स्वतःच्या खर्चानें व हिमतीनें उघडली. शिक्षक मिळेनात म्हणून स्वतःच्या आज्ञांकित साध्वी पत्नीस स्वतः शिकवून चांभारांच्या मुलींस शिकवावयास बसविलें. ह्या भ्रष्टाकाराबद्दल ह्या दोघांहि सत्पुरुषांना त्यांच्या ज्ञातीनेंच नव्हे तर आप्तांनीं व प्रत्यक्ष आईबापांनीं बाहेर घातलें. सारांश, बहुजनाच्या हिताचें एकहि कार्य दोघांच्या प्रयत्नक्षेत्रांत आल्यावांचून उरलें नाहीं.
(६) पुढें जो देशांत राजकारणाचा व स्वदेशाभिमानाचा अश्वमेध पेटणार होता, त्याची पूर्वभूमिका तयार करण्याचें कठीण आणि अपूर्व काम करण्यांत दोघांचीं आयुष्यें खर्चीं पडलीं. धार्मिक व सामाजिक सुधारणेचा बळकट पाया दोघांनीं घातला म्हणूनच पुढें निरनिराळ्या देशहिताच्या विशिष्ट चळवळी करण्याचें काम त्यांच्या मागून येणा-यांना सोपें किंबहुना शक्य झालें.
(७) दोघे भावनामय, उदार, निष्कपटी, सरळ, सडेतोड, धोपटमार्गी, दाक्षिण्यपूर्ण व प्रतिपक्षाला क्षमा करणारे होते. दोघेहि ईश्वरानें झपाटलेले, अनुयायांना ओढून घेणारे, त्यांच्यावर छाप बसविणारे, नवीन समाज किंबहुना नवयुग संस्थापणारे आणि भविष्यवादी प्रवक्ते होते.
(८) दोघांमध्यें कांहीं समान दोषहि होते. पण ते अपरिहार्य व क्षम्य होते. दोघेहि हुल्लडखोर, केव्हां केव्हां स्वतःच्या उलट निष्कारण वैरी उत्पन्न करणारे व अतिकांक्षी होते. त्यामुळें त्यांचे अनुयायांनाहि ते प्रसंगविशेषीं असह्य झाले. सर्व धर्मांची सांगड घालून कांहीं नवीन विधि व व्रतें प्रचारांत आणण्याचा जालीम प्रयत्न केशवानें ‘नवविधान’ ह्या नांवानें केला. जोतिबानेंहि आपली परिस्थिति, सामर्थ्य, उपकरणें ह्याच्यापलीकडची कांहीं कार्यसिद्धि करावी, असा हव्यास धरिला. पण ह्या दोषांमुळें दोघांच्या मनाच्या मोठेपणाचीच साक्ष पटते.
(९) दोघांनाहि ह्या सात्त्विक महत्त्वाकांक्षेमुळें प्रतिपक्षाचा व स्वकीयांचा तीव्र छळ सोसावा लागला व त्यांचे अंतकाळीं फार हाल झाले.
(१०) दोघेहि मरेपर्यंत निकरानें लढले म्हणून दोघेहि अपूर्व धर्मवीर होते, ह्यांत शंका नाहीं.
वर साम्य दाखविलें. त्याप्रमाणेंच ह्या दोघांमध्यें भेदहि आहेत.

महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)

 (१) केशव इ. स. १८३८ त जन्मून १८८४ त वारला. तो सेन नांवाच्या ज्या अगदीं खानदानी कुळांत जन्मला तें क्षत्रिय आणि वैश्य ह्यांमधील एक थोर व कुलीन घराणें आहे. त्याचा संबंध एके काळीं बंगालचे राजे असलेलें सेन घराणें त्याच्याशीं असण्याचा संभव आहे. एकूण जगिक दृष्टीनें केशव हा कुलीन आणि गर्भश्रीमंत होता. जोतिबा इ. स. १८२७ त जन्मून १८९० सालीं वारला. तो एक अत्यंत गरीब माळी जातीच्या घराण्यांत जन्मला. आत्मिक दृष्ट्या ह्या भेदाला मुळींच महत्त्व नाहीं.
(२) केशवाला जरी विश्वविद्यालयाची इंग्रजी पदवी नव्हती तरी आधुनिक “सुशिक्षण” म्हणून गाजणा-या संस्कृतीची त्यावर पूर्ण कृपा होती. जोतिबाचें व लक्ष्मीचें जसें वांकडें होतें तितकें वांकडें नसलें तरी सरस्वतीचें त्याच्याशीं सख्यहि पण नव्हतें. त्याला गरजेपुरतें मराठी व मोडकें तोडकें तोडकें इंग्रजी येत होतें. पण जोतिबा बहुश्रुत होता, तरी शाब्दिक ज्ञानाचा त्याच्यावर म्हणण्यासारखा संस्कार नव्हता, असें त्याच्या ग्रंथांतील ओबडधोबड व क्वचित प्रसंगीं सदोष विचारांवरून व अशुद्ध व्याकरणांवरून दिसतें. ख-या धर्ममार्गांत लक्ष्मीप्रमाणेंच सरस्वतीचीहि किंमत फुटक्या कवडीचीहि नसल्यामुळें, जोतिबाला त्या दोघींची तमा नव्हती. केशवाच्या पायांत ह्या दोघींचा जो अडथळा होता, तो जोतीच्या नव्हता, हें त्या महात्म्याचें भाग्य होय.
(३) वरील भेदामुळें ह्या दोघांच्या कार्यक्षेत्रांत व कार्याच्या विस्तारांत फारकत झाली व दोघेहि एकदेशीय कर्ते पुरुष ठरले, हा मुद्दा विशेष ध्यानांत घेण्यासारखा आहे. केशवाचें क्षेत्र आधुनिक शिक्षणामध्यें अर्धवट होरपळून निघालेल्या हतभागी तेवर्णिकांपुरतेंच ठरलें, त्याचप्रमाणें जोतीचें क्षेत्र बाकी उरलेल्या ईश्वराच्या दृष्टीनें भाग्यवान् पण जगाच्या दृष्टीनें शूद्र व अतिशूद्रांमध्येंच ठरलें. “शूद्रादि अतिशूद्र” हें वर्गीकरण स्वतः जोती महात्म्याचें; तें केवळ शाब्दिक नसून तीच त्याच्या कार्याची अनुल्लंघनीय मर्यादा होती. अशा रीतीनें दोघेहि एकदेशीय झाल्यानें, ब्राह्म समाज आणि सत्य समाज ह्या दोन्ही संस्थांचें ध्येय व कार्य तंतोतंत एक असूनहि हे दोन्ही समाज अजूनसुद्धां तुटक तुटक नांदत आहेत ! किंबहुना एकमेकांस नुसती तोंडओळखहि नाहीं, असें म्हणण्यांत अतिशोक्ति मुळींच नाहीं !! ही एक ईश्वरी लीलाच !!!
(४) आधुनिक संस्कृतीच्या लाटेवर बसून केशवानें नुसत्या हिंदुस्थानांतच नव्हे तर सा-या जगांत जेथें जेथें ही भरीव अथवा पोकळ संस्कृति शिरूं शकेल तेथें तेथें आपली सत्यधर्माची सुवार्ता गाजविली. पण जोती बिचारा आपल्या भीमथडी तट्टावर बसून महाराष्ट्राच्या एका कोप-यांत आपला सार्वजनिक सत्यधर्माचा डफ साळी, माळी, तेली, तांबोळी किंबहुना त्यांच्याहूनहि खालील जातींचे जे महारमांग ह्यांच्यापुढें वाजवीत असे. इकडे लहुजी मांग हा जोताचा गुरु, तर तिकडे जगविख्यात पंडितशिरोभूषण राममोहन राय हे केशवाचे आजेगुरु होते. केशव इंग्लंडांत व त्याचे शिष्य ब्रह्मदेश, अमेरिका, जपान, सिंहलद्वीप, अरबस्थान वगैरे देशांत संचार करून आले. जोती पुण्याच्या बाहेर गेला असेल नसेल; त्याचे शिष्यहि दक्षिण महाराष्ट्र किंवा कोंकणांत त्याच्या वेळीं गेले असल्याचा पुरावा नाहीं.
(५) केशवाला जिवंतपणींच त्याच्या कार्यांत यशाचा वांटा मिळावयाचा तो मिळाला. इतकेंच नव्हे तर शेवटीं त्याच्या यशाला किंचित् ओहोटी लागून त्याला निराशेचा चटका थोडाफार बसला. जोतीचें आयुष्य समग्र अपयशांतच गेलें. केशवांप्रमाणें शिष्यांची प्रभावळ जोतीभोंवतीं जमली होती, तरी त्यांचा मगदूर कमी ठरून जोतीनें पेरलेलें झाड त्याच्या नजरेंत भरेल इतकें भुईवर उमटलें नाहीं. पण त्याचेमागून तें आतां महाराष्ट्रांत जीव धरून कदाचित् बाहेरहि आपल्या शाखा पसरील अशा आशा करण्यास जागा आहे. तथापि ब्राह्म समाज व सत्य समाज हे असेच ह्यापुढेंहि सवता सुभा करीत राहतील, तर त्यांच्या आशा सर्व पोकळ. जोतिबाची काय कथा तर केशवाचेंहि नांव भावी ज्ञानकोशांत धुंडाळावें लागेल. आजकालच्या ज्ञानकोशांत ह्या दोघांचीं नांवें चकाकत नसलीं तर तो दोष ह्या दोघांचाहि नसून तो सर्वांशीं ज्ञानकोशाचा व कांहीं अंशीं ह्या दोन्ही समाजांच्या अर्धवट व अपात्र अनुयायींचाच म्हणणें भाग आहे.
(६) दोघांच्या शिक्षणांत व परिस्थितींतच नव्हे तर, स्वभावांत व प्रयत्नांतहि मोठा भेद आहे. केशव बंगाली वैष्णव कुळांत जन्मला व वाढला असल्यानें त्याच्यामध्यें कोमल व सर्वसंग्राहक भावनांची दैवी संपदा परंपरागतच होती. तो स्वतः मोठा रसिक भक्त होता, आणि खंदा विधायक घटनाचतुर होता. इकडे आमचा प्रिय जोती म्हणजे सह्याद्रीच्या रुक्ष घाटमाथ्यावरच्या कांटेरी रानांतील एक रानफळ होतें म्हणून त्याचें आयुष्य आपल्या बोथट विळ्या खुरप्यांनीं खंडणमंडणाचें जंगल तोडण्यांत, खडकाळ व रेताळ जमीन खणण्यांत व खुजट झालेल्या कदान्नाचें पीक कोळपण्यांतच घालवावें लागलें. केशवानें मधमाशीप्रमाणें चहूंकडून सत्यसंचय उदार सहानुभूतीचे जोरावर केला. ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध, वैदिक इत्यादि निरनिराळ्या धार्मिक संस्कृतीचे अमृतबिंदु गोळा करण्याच्या कामावर निरनिराळे अधिकारी शिष्यांची योजना केशवानें चतुराईनें केली, व आपल्या “नवविधान” रूपी सर्वसंग्राहक सत्यमंदिराची उभारणी करून दाखविली. परंतु जोतिबानें शिक्षणाच्या अभावीं बाहेरून मध न गोळा करितां केवळ आपल्याच अंतःप्रेरणेनें कोळ्याप्रमाणें आपल्याच रुक्ष पोटांतून सार्वजनिक सत्यधर्माचे तंतु बाहेर काढून, त्यांचें जाळें विणून सर्व बहुजनसमाजाला आवरण्याचा हव्यास धरिला. ह्यांत कोण मोठा, कोण लहान, कोण खरा, कोण खोटा, हें न ठरवितां दोघेहि धाडसी आणि यशस्वी बंडखोर होते, येवढें तरी त्यांच्या शत्रूंना कबूल करण्याची लाज कां वाटावी, हें कळत नाहीं.
(७) सूफी भक्त, ख्रिस्ती साधु, बौद्ध श्रमण वगैरे सर्व रसिकांपुढें केशव दंडायमान लीन होत असे; तसेंच त्यानें हिंदु संस्कृतील चैतन्य देव आणि समकालीन स्वामी रामकृष्ण परमहंस वेदान्ती ह्यांचें शिष्यत्व पत्करिलें. ह्या लीनपणामुळें त्यानें आर्य समाजाचे संस्थापक स्वामी द्यानंद आणि नवीन वेदान्ताचे जगजाहीर पुरस्कर्ते स्वामी विवेकानंद ह्यांवरहि आपली छाप बसविली, व त्यांना मार्ग दाखविले. इकडे आमच्या फटकळ जोतिबाला ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकारामासारख्या संतांचीदेखील कदर ओळखतां आली नाहीं. मग त्यानें ब्रह्म समाज आणि प्रार्थना समाजाच्या शुद्ध हेतूंचा अभद्र विपर्यास केला, ह्यांत सूज्ञांना काय वाईट वाटून घ्यावयाचें आहे बरें? केशव सकळ संतांना, सर्व धर्मग्रंथांना उराशीं धरतात. पण जोतिबा आपल्या सत्यधर्म पुस्तकांतील १०५ पानावर खालील कर्कश विधान करीत आहेत !
“अज्ञानी शूद्र अतिशूद्रांच्या करपट्टींतून धूर्त आर्य भटब्राह्मणांचीं मुलें जेव्हां शाळांनीं विद्वान झालीं, तेव्हां त्यांच्या पूर्वजांनीं बाह्यात्कारी धर्मसंबंधीं परंतु आंतून शुद्ध राजकीय रचिलेल्या ब्रह्मगारुडावर केवळ झांकण घालण्याकरितां कपटानें आपला बचाव करण्यास्तव, आपल्या डोळ्यावर कातडी ओढून मोठ्या धांदलीनें त्यांनीं ब्राह्म समाज व प्रार्थना समाज उभारले आहेत; व त्यांनीं त्या समाजांत एकंदर सर्व ख्रिस्ती धर्माचें उष्टें माष्टें चोरून छपून गोळा केलें आणि त्यांनीं आपल्या कल्पित ब्रह्माजीच्या पुढें डोळे झांकून बाकीच्या अज्ञानी शूद्रादि अतिशूद्राच्या मनांत पुनः एक
त-हेचा ब्रह्मघोळ करण्याची खटपट सुरू केली आहे.”
ह्या वरील अडाणी उद्गाराबद्द जोतिरावाला काय नांवें ठेवावींत? त्याचें हृदय उपाशीं जनतेच्या वेदनेनें हैराण झालें होतें. डॉ. केतकरांसारखे महापंडित आपल्या क्वचित् स्थळीं विषारी ज्ञानकोशांत, ब्राह्म समाज केवळ “धर्मनाशक व राष्ट्रनाशक आहे,” तो पसरणें “इष्ट नाहीं” अशीं विधानें आजहि प्रसिद्ध करीत आहेत; तर मग अडाणी जोतिरावानें एकाद्या परकीय मिशन-याचें ऐकून वरील बेजबाबदार वाक्य आपल्या पवित्र पुस्तकांत राहूं दिलें, तर तिकडे कानाडोळा करण्यांतच अधिक धार्मिकपणा आहे. पण त्यातंल्या त्यांत ब्राह्म समाज उठल्या सुटल्या “सुशिक्षित”
म्हणविणा-यांचीच बहुतेक काळजी वाहत आहे; व तो आपलीं गोड गाणीं शहरांतच म्हणून स्वर्गास पोंचूं पाहतो, ही गोष्टहि अगदीं खोटी नाहीं. अडाणी जनतेच्या कैवा-यांच्या प्रामाणिक आसुडांचे फटके आणि “सुशिक्षितांचे” अप्रामाणिक आक्षेप, ह्या दोन्ही दिव्यांतून बंगाल्यांतील ब्राह्म समाज आणि इकडील प्रार्थना समाज सुरक्षित बाहेर पडून ते स्वतःचे डोळे उघडतील तेव्हांच त्यांना केशव आणि जोतिबा ह्या दोघांचीं कार्यें कशीं केवळ एकदेशीय झालीं, हें दिसेल. आणि तेव्हांच ह्या समाजांना जगण्याची आशा प्राप्त होईल. अशिक्षित व असंघटित सत्यशोधकांची गोष्ट तर दूरच राहो.
(८) केशवाला राजा राममोहन राय आणि महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर ह्या दोन महापुरुषांनीं दोन पिढींत मेहनत करून तयार केलेली आदि ब्राह्म समाजाची भूमिका आयतीच तयार मिळाली. त्या भूमिकेंत पेरण्याचें व फुलें तोडण्याचें काम केशवनें केलें व त्यांत त्याला यशहि आलें. इकडेहि जोतिबाला हीच भूमिका सहज मिळाली असती. केशवच्या श्रमानेंच नव्हे तर त्याच्या पूर्वींपासून कांहीं महाराष्ट्रीय सुशिक्षितांनीं सन १८४० पासून मुंबई शहरीं परमहंस समाज नांवाची एक संस्था काढून समाजजागृतीचें अर्धवट काम चालविलें होतें. केशवानें असल्या बहिर्मुख प्रयत्नांत आध्यात्मिक भक्तीची फुंकर मारिली; तेव्हां मुंबई, पुणें, सातारा, नगर वगैरे अनेक ठिकाणीं प्रार्थना समाज इ. स. १८६७ पासून १८७४ च्या आंत स्थापन झाले. आणि त्यांत जोतिबाहि उघड जात येत होता. रानडे, भांडारकर ह्या अध्वर्यूंची दाट ओळख आणि गोवंडे, वाळवेकरांसारख्या प्रार्थना समाजिस्टांचें तर जिव्हाळ्याचें साह्य असूनहि, जोतिबानें तुसडेपणानें प्रार्थना समाजाशीं असहकार्यच पत्करलें. ह्यांत तत्कालीन रहस्य व परकीयांची कांहीं तरी कारवाई ह्यांचा वास येत आहे. तें कसेंहि असो, ही पूर्वभूमिका सोडून जोतिबांनीं सवता सुभा करून सन १८७३ मध्यें ‘सत्यशोधक समाज’ नांवाचा वेगळा समाज काढिला. बंगाल्यांत मात्र असें झालें नाहीं. ह्याचें कारण एक तर प्रार्थना समाजाचे इंग्रजी भाषेंतील संस्कृत विचार अडाणी जोतीला समजले नसावेत, किंवा जोतीच्या प्रामाणिक हृदयाला बसलेला “शूद्रादि अतिशूद्राच्या” वेदनांचा चटका प्रार्थना समाजांतील संभावितांना बसला नसावा. कारण कांहींहि असो, केशव आणि जोती समकालीन असूनहि एकमेकाला पारखे झाले. कर्नल ली ग्रँड जेकब व सर वुइल्यम जोन्स वगैरेंनीं वेद उजेडांत आणिले, असें आपल्या पुस्तकांत वेळोवेळीं सांगून अथर्व वेदांतील उतारे देणा-या जोतिबाला, महर्षि देवेंद्रनाथ ठाकुरांनीं इ. स. १८५० सालीं वेदांचें शाब्दिक प्रामाण्य उघड झुगारून दिलें व ब्राह्मधर्म म्हणजे केवळ सार्वजनिक सत्यधर्म आहे ही राममोहन रायांनीं २० वर्षांपूर्वीं दिलेली साक्ष खरी केली. ह्या गोष्टी कशा माहीत नव्हत्या, आणि ह्या सत्यधर्माची द्वाही प्रतापचंद्र मुजुमदार व त्याच्या प्रतापि गुरु केशव युरोप अमेरिकेंत गाजवून कैक वेळां परत स्वदेशीं आले तरी ह्याची कुणकुणहि जोतिबाला कशी कळली नाहीं, हें आश्चर्य आहे ! कोणत्या देवानें अगर दैवानें केशव आणि जोतिबा ह्यांच्यामध्यें हा आडपडदा सोडला होता, हें जाणणें फार कठीण नाहीं. हिंदुस्थानचे मूठभर “सुशिक्षित” पुढारी आणि खंडवजा अफाट बहुजनसमाज त्यांच्यामध्यें हा दुर्दैवी पडदा अद्यापि लोंबत आहेच ना? पहिल्याची भाषा दुस-याला समजत नाहीं, व दुस-याची कळ पहिल्याच्या काळजाला झोंबत नाहीं. आतां कोणीं कोणाच्या वंशाला जावें, म्हणजे हा भेदक पडदा नाहींसा होईल?

  1. मराठ्यांविरुद्ध आगळीक
  2. मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
  3. मराठेतर कोण ?
  4. मराठे हिशेबी नाहींत
  • 60
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
Page 65 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी