1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

निराळे भागवत पंथ

शाक्त आणि शैव पंथाचा 'वैदिक' धर्माशीं फारच अल्प आणि अप्रत्यक्ष संबंध आहे, हें पहिल्या व्याख्यानांत सांगितलेंच. शैवांतील विशेषतः लिंगायत पंथ तर वेदाला मुळींच न मानतां आगमाला मानतो. द्रावीड शैवांचा शैवसिद्धान्त स्वतंत्रच आहे. त्यांचा वेदापेक्षां आगमाशींच जास्त संबंध आहे. जैन व बौद्धहि वेदाला जुमानीत नाहींत. राहतां राहिलेले विष्णु भागवत. हे वेदापेक्षां आपल्या अंतःकरणांतील श्रद्धाभक्तीवर आणि भगवंताच्या कृपेवरच जास्त अवलंबून असतात. ह्या भक्ति आणि कृपा तत्त्वांचा विकास प्रस्थानत्रयींतील शेवटलें ठाणें जी भगवद्‍गीता तिच्यापासून तो आतांपर्यंत सारखा वाढत्या प्रमाणावर होत आला आहे. गीतेंत जसें बहुदेवांच्या त्रैगुण्यविशिष्ट वेदांना गौणत्व आणि अनन्य भक्तीला श्रेष्ठत्व दिलें आहे, तसेंच भागवत धर्माचा ज्याला 'कळस' अशी पदवी वारकर्‍यांनीं दिली, त्या आधुनिक तुकाबालाहि वेदाचें महत्त्व फारसें वाटलें नाहीं. बाकी उरले जे शंकर, वसुगुप्‍त, रामानुज (काश्मीरचा), मध्व, निंबार्कवल्लभ इ. शाक्त, शैव, वैष्णव आचार्य. त्यांनी मात्र आपल्या मतांचा संबंध वेदांशीं, उपनिषदांशींख् निदान ब्रह्मसूत्राशीं तरी लावला आहे, पण भागवत धर्म जसें एक मत आहे, तसाच तो एक धर्महि आहे. किंबहुना त्याच्या मतापेक्षां त्याच्या उपासनाभागाचा किंवा भक्तितत्त्वाचा परिणाम हिंदुस्थानांतील लहानथोर सर्व समाजावर अधिक सात्त्विक आणि टिकाऊ असा झाला आहे, हें निर्विवाद आहे. म्हणून ह्या धर्मांतील आचार्यांपेक्षां ह्या धर्मांतील संतांवरच विष्णु भागवतांचा अधिक भर आहे. असो. ह्या भागवत धर्माचा पाया ज्या वरील पांच भागवतांनीं घातला त्यांचा आतां क्रमशः विचार करूं या.

नामांच्या विभक्ति

कानडींत नामाचें विभक्तिरूप व्हावयाचें तें शब्दाच्या मूळ रूपाला हा किंवा तो या अर्थीं जें सर्वनाम असेल त्याच्या विभक्तीचीं रूपें लागून सिद्ध होतें. हें विभक्तीचीं रूपें बारकाईनें तपासून त्यांचा माग काढीत गेल्यास दिसून येण्यासारखें आहे. हाच प्रकार मराठींतहि आहे. घोडियाचा, पाणियांत, माळियाला, इत्यादि जुन्या मराठींतील रूपांवरून इयाचा, इयांत, इयाला हीं ‘ई’ ह्या सर्वनामाचीं रूपें लागलेलीं स्पष्ट दिसतात. ‘ई’ हा कानडींतील ‘हा’ या अर्थीं दर्शक सर्वनामवाचक शब्द आहे. गुरु शब्दाला ह्या ‘ई’ सर्वनामाच्या विभक्तीचीं रूपें जोडून कानडींत गुरविनगे (द्वितीया), गुरविनिंद (तृतीया), गुरविन (षष्ठी) अशीं रूपें होतात. कोंकणांत पूर्वीं कानडीचा जास्त प्रचार असावा, म्हणून तिकडे घोडयेक (एकवचन), घोड्यांक (अनेकवचन) अशीं चतुर्थीचीं रूपें होतात. हा ‘क’ प्रत्यय कानडीचा आहे.
कानडींत अण्णा आवरू अथवा अण्णानवरू बंदरू म्हणजे अण्णा ते आले असा प्रयोग होतो ! ह्याच धर्तीवर बंगलूरकडचे मराठे अद्यापि ‘अण्णा आले’ असें न म्हणतां ‘अण्णा त्यांनीं आले’ असें म्हणतात. शके १५०० मधील त्र्यंबक कवीनें आपल्या ‘बालबोध’ नांवाच्या योगावरील ग्रंथांत म्हटलें आहे कीं, ‘भलेतेणें एथ नावें, प्रयागीं माधवीं विश्वरूपो तें पहावें, एतुलेनी संसारा देयावें, तिलोदक’ ह्यांत भला ह्या शब्दाला तो ह्या सर्वनामाचें तृतीयेंचें रूप लागलें आहे. आणि भल्यानें त्यांच्याऐवजीं भलेतेणें असा प्रयोग झाला आहे. मराठीमध्यें सामान्य रूपाचा जुन्या षष्ठीचा जसा संबंध आढळतो तसाच कानडींतहि आढळतो. म्हणजे मनुष्यन असें षष्ठीचें रूप होतें, त्यालाच प्रत्यय लागून मनुष्यनन्नु, मनुष्यनिंदे, मनुष्यनिगे असें द्वितीयेचें, तृतीयेचें, चतुर्थीचें रूप होत जातें. ह्यावरून हा प्रचार कानडींतून आला असण्याचा संभव आहे. कारण, त्याजला, माझ्याच्यानें, तुमच्याहून, या षष्ठीच्या प्रत्ययाला पुनः इतर विभक्ति लागण्याचा दुहेरी प्रकार मराठींत नसतो. तींत तो विकल्पेंकरून आहे, तर कानडींत षष्ठीचें रूप जणूं कांहीं एक प्रकारचें प्रातिपदिकच होऊन बसलें आहे. ‘आंत’ हें शब्दयोगी अव्यय लावून सप्तमी करण्याचा नवीन प्रकार तसेंच ‘आमच्या येथें’, ‘तुमच्या तिकडे’ असे प्रयोगहि कानडीवरून येणें पुष्कळ शक्य आहे.

नामदेव तुकाराम

भागवत धर्माचा प्रसार होतां होतां त्याची अवनति किती आणि कशी झाली, हें मागें सांगितलें आहेच. अंधभक्तिभावाचा बहुजनसमाजांत प्रसार म्हणजे भामटेगिरीला मुक्तद्वारच! भक्त आणि भामटा ह्यांचें साहचर्य म्हणजे फूल आणि भुंगा ह्यांच्या साहचर्याप्रमाणेंच आहे. भागवत धर्माची जशी पारमार्थिक दृष्टि आहे तशीच मानवी दृष्टीहि आहे. भक्तांचें लक्ष ख-या देवांवरून उडतें न उडतें तोंच भामट्यांनीं त्याला घेरलेंच समजावें. ह्यामुळें जगांत सर्वत्र सर्वकाळीं भागवत धर्माला देव आणि भामटे यांचे हेलकावे खावे हे लागणारच?

नानक चरित्र

शीख धर्माचा संस्थापक गुरु नानक हा लाहोर जिल्ह्यांत तळवंडी ह्या गांवी इ. स. १४६९ सालीं वैशाख शुद्ध तृतीयेला जन्मला. त्याच्या बापाचें नांव कालू आणि आईचें नांव त्रित्पा. कालूचें कुल क्षत्रिय असून धंदा तलवंडीच्या कुळकर्णीपणाचा होता. नानक सात वर्षांचा झाल्यावर त्याला शाळेंत पाठविण्यांत आलें. पण आपणांस शिकविण्याची योग्यता शिक्षकांत आहे काय, असें त्यानें विचारलें; कारण त्याला ईश्वरी ज्ञान शिकावयाचें होतें. नानकानें स्वभाषेप्रमाणें पार्शी भाषेचाहि चांगला अभ्यास केला. त्या भाषेंतील इस्लामी धर्माच्या ज्ञानामुळें त्याच्या भावी धार्मिक मतांवर परिणाम झाला असावा. तो नऊ वर्षांचा झाल्यावर मुंज करून जानवें घालण्याचा विधी झाला. तेव्हां त्यानें एक कविता केली कीं, दया हा कापूस, समाधान हा दोरा, संयमन ही गांठ आणि सत्य हा पीळ, असें जानवें मळत नाहीं कीं तुटत नाहीं. एरव्ही मनुष्य मेला कीं इतर सुतांचें जानवें गळून पडतें आणि आत्मा जानव्याशिवायच जातो. मग अशा सुताड जानव्याचा काय उपयोग ? पुढें नानकाचें लक्ष कांहीं केल्या संसाराकडे लागेना म्हणून त्याच्या आईबापाला फार काळजी पडली. कोणी म्हणूं लागले, नानकाला खूळ लागलें !  कोणी त्याला आजारी समजून गांवच्या वैद्याला बोलावून आणिलें. नानक हसून म्हणाला, ‘आजार माझ्या मनांत आहे, तर तो माझ्या हाताची नाडी पाहून कसा कळेल ?’ पंजाबचा सुभेदार दौलतखान नामें मुसलमान होता. त्याचा एक फडणीस जयराम नांवाचा हिंदु सुलतानपूर येथें राहात होता. तो नानकाचा मेहुणा होता. त्याच्या वशिल्यानें शेवटीं नानकास कोठी कामगार नेमण्यांत आलें. कांहीं दिवस काम चांगलें केल्यावर नानकानें पूर्वींप्रमाणेंच टाळाटाळी चालविली. रानांत जाऊन तो तीन तीन दिवस बसे, “ कोणी हिंदु नाहीं व कोणी मुसलमानहि नाहीं” असें तो वरचेवर म्हणे. मुसलमानाच्या काजीला राग येऊन त्यानें नानकास सुभेदारापुढे उभें केलें. नानक गाऊं लागला, “दया ही मशीद, प्रामाणिकपणा हेंच आसन, न्याय आणि कायदा हेंच कुराण, विनय हीच सुन्ता, सभ्यता हाच उपवास व अशानेंच मनुष्य मुसलमान होतो ” असें नानकानें आपल्या म्हणण्याचें तात्पर्य सांगितलें. इतक्यात नमाजाची वेळ झाली म्हणून काजी मशिदींत गेला. नानकहि त्याचे मागोमाग गेला. काजी प्रार्थना करूं लागला, तर नानक हसूं लागला ! काजीनें कारण विचारतां नानक म्हणाला, ‘ काजीचें लक्ष प्रार्थनेकडे नसून त्याचें शिंगरूं सुटून आडांत पडेल, ह्या विचाराकडे त्याचें सारें लक्ष लागलें आहे !’ काजी खजील झाला !!

नानकाचा मर्दाना नांवाचा डोम जातीचा एक स्वामिनिष्ठ शिष्य होता. त्याला घेऊन नानक यात्रेला निघाला. कामरूप ( आसाम ) नंतर जगन्नाथपुरी येथें जाऊन आणि सर्व पूर्व हिंदुस्थानभर फिरून परत पंजाबांत आला. नंतर दोघें पाकपट्टण येथें शेख फरीद हें मुसलमानी क्षेत्र पाहावयास गेले. तेथील साधु शेख इब्राहिम हा नानकाचा अनुयायी झाला. पुढें नानक सैय्यदपुरास गेला असतां, त्या गांवावर लवकरच बाबरानें हल्ला केला; आणि बहुतेक सर्व लोकांची कत्तल केली. ह्याचा हृदयद्रावक उल्लेख नानकानें आपल्या कवनांत केला आहे. त्या वेळीं बाबरचा सरदार मीरखान ह्यानें नानक आणि मर्दाना ह्यांना कैद करून कामाला लावलें. नानकाच्या डोक्यावर जें ओझें दिलें होतें तें एका हाताच्या अंतरावर अंतराळांतच राहिलें असलेला चमत्कार मीरखानानें पाहिला. बाबरहि नानकाला पाहावयाला तुरुंगांत आला. असा साधु ह्या गांवांत आहे, असें कळलें असतें, तर ही कत्तल मीं केली नसती, असें तो म्हणाला. मग नानकाचा त्यानें मोठा सत्कार करून त्याच्या सांगण्यावरून सर्व बंदीवानांना मुक्त केलें. ह्यानंतर एका पंजाबी व्यापा-यानें शीख धर्माची दीक्षा घेऊन तो व्यापारानिमित्त सिलोन येथें गेला. त्याच्यामार्फत सिलोनचा राजा शिवनाभ ह्याचें लक्ष शीख धर्माकडे वळलें. पुढें नानक दोघा शिष्यांना घेऊन दक्षिणेंत मद्रासेकडे यात्रेस गेला. तेथें कांहीं जैन संन्याशांना त्यानें शीख केलें. पुढें पूर्व समुद्रांतील कांहीं बेटांत (लखदीव, मालदीव) त्यानें आपल्या धर्माचा प्रचार करून मग सिंहलद्वीपांत गेला व तेथील राजाला शीख धर्माचा उपदेश केला. याच ठिकाणीं त्यानें आपलें प्राणसंगली नांवाचें स्तोत्र रचिलें.

सिंहलद्वीपाहून परत आपल्या देशीं गेल्यावर नानकानें कित्येक हिंदु पंडित, योगी, गोसावी, फकीर वगैरेंना शीख धर्माची दीक्षा दिली. नंतर तो काश्मिरांतून हिमालयांत गेला. तेथून पुढें वायव्येकडे पेशावर, कंदाहार, वगैरे मुसलमानी क्षेत्रांची यात्रा त्यानें केली. त्यानंतर तो मक्केच्या यात्रेला निघाला, त्यावेळीं त्यानें मुसलमान फकीराचा वेश केला होता. बरोबर मर्दाना होताच. मक्केस जाईपर्यंत तो फारच थकला. तेथें गेल्यावर मक्केच्या मशिदींतील काब्याकडेच पाय करून निजला. एका मुसलमानानें त्याला रागानें उठविलें. त्याचे पाय जातील तिकडे सर्व मशीद फिरूं लागली, तेव्हां त्याच्या भोंवतीं तेथील सर्व मुल्ला जमले. ते विचारूं लागले कीं, हिंदु धर्म श्रेष्ठ कीं मुसलमानी धर्म श्रेष्ठ ? नानकानें उत्तर केलें, ‘ सत्कृत्याशिवाय दोन्ही धर्म व्यर्थ आहेत. ज्याअर्थीं दोन्ही धर्म एकमेकांचा द्वेष करतात, त्याअर्थीं ते दोन्हीहि खोटेच आहेत.’ हें ऐकून सर्व मुल्लांनीं व मुख्य गुरूनेंहि त्याचा सत्कार केला. ह्यानंतर नानकानें मदीना, बगदाद, वगैरै ठिकाणीं जाऊन आपल्या सार्वत्रिक धर्माचा संदेश गाजविला. स्वदेशीं परत आल्यावर लवकरच त्याचा एकनिष्ठ शिष्य मर्दाना वारला. ह्या वेळीं नानकाच्या भोवतीं शिष्यसमुदाय पुष्कळ जमला होता. पण त्यांपैकीं थोडेच खरे होते. त्याची परिक्षा केली असतां लहिना नांवाचा एक शिष्य खरा ठरला. नानकाला दोन मुलगे, श्रीचंद आणि लखमीदास नांवाचे होते; पण दोघेहि त्याच्या गुरुपणाचा वारसा चालविण्याला नालायक होते, म्हणून त्यानें आपल्या मागें अंगदाला आपल्या जागेवर नेमलें. इ. स.१५३८ सालीं आश्विन शुद्ध दशमीचे दिवशीं नानकानें समाधि घेतली. मुसलमानांनीं त्याच्या नांवानें रावी नदीचे कांठीं मशीद बांधली, आणि हिंदूंनीं देऊळ बांधिलें. पण हीं दोन्हीहि पुढें पुरानें वाहून गेलीं व भांडणाचें मूळच गेलें.

ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य

परंतु समाजसुधारणेचें कार्य आमच्या देशांत जें इतक्या सावकाशीनें व अल्पप्रमाणांत प्रगति करीत आहे, त्याच्या आणखी एका कारणाचा, (व माझ्यामतें सर्वांत महत्त्वाच्या अशा कारणाचा) अद्यापहि उल्लेख करावयाच आहे. आणि तें म्हणजे शुद्ध सामाजिक सुधारणेचें म्हणविलें जाणारें कार्य अद्यापहि बुद्धिपुरस्सर धर्मापासून अलिप्त ठेविलें आहे हें होय. कै. आगरकरांसारखे जुन्या परंपरेंतील समाजसुधारक या कार्याची उभारणी अद्यापहि उपयुक्ततावाद, युक्तिवाद, भूतद्या वगैरे दुस-या कोणत्याहि तत्त्वावर करण्यास तयार असतात; पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्यास तयार नाहींत. त्यांना एक तर अशा प्रकारच्या धार्मिक मनोवृत्ति नसतात किंवा असल्या तरीहि त्यांचा उपयोग करण्याची त्यांची प्रवृति नसते आणि अशा त-हेची ही धर्मविन्मुख प्रवृत्ति समाजसुधारकांमध्यें असावी ही अगदीं दुर्दैवाची गोष्ट आहे इतकें तरी निदान म्हटल्यावांचून माझ्याच्यानें राहवत नाहीं. या धार्मिक औदासिन्यामध्यें हल्लींच्या काळच्या परिस्थितीचा आपणास दुजोरा आहे अशी कदाचित् त्यांची समजूत दिसते. फ्रान्सांतील मोठ्या राज्यक्रांतींतील प्रमुख पुढारी धर्मविन्मुखवृत्तीचे होते, तसेंच रशियन राज्यक्रांतींतील पुढारीहि असेच धर्मविन्मुखवृत्तीचे होते, इतकें कीं त्यांतील कांहींजणांना तर धर्मांसंबंधीं वावडें होतें. युरोप व अमेरिका खंडांमध्यें सामाजिक सुधारणा (Socialism) म्हणून जें कार्यक्षेत्र उल्लेखिलें जातें त्याचे पुरस्कर्ते ज्या झेंड्याखालीं काम करतात त्यांत धार्मिक वृत्तीचा अंशहि नाहीं. आणि अगदीं जवळचें उदाहरण घेऊनच बोलायचें म्हटलें तर केवळ धार्मिक बाबतींतील तटस्थवृत्तीमुळेंच इंग्रज लोकांना हिंदुस्थानांत पाय रोवतां येऊन आपलें वर्चस्व राखतां आलें. त्याचप्रमाणें केवळ हिंदुस्थानांतीलच नव्हे तर सर्व सुधारलेल्या जगांतील सार्वजनिक शिक्षणपद्धति मुख्यतः धार्मिक तटस्थवृत्तीच्या पायावरच उभारलेली आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्यें वावरल्यामुळेंच आजकालच्या सर्वसाधारण समाजसुधारकांना आपल्या धोरणास व वृत्तीस दुजारा असल्यासारखें वाटतें हें खरें. पण उलटपक्षीं ज्या हिंदु धर्माची त्याच्या शुद्धतेबद्दल, सनातनत्वाबद्दल व संग्राहकत्वाबद्दल पूर्वींच्या काळीं इतकी ख्याति होती त्याच्याच आजकालच्या लाकडी सांपळ्यांत हल्लीं समाजसुधारकांचा समावेश करण्याइतकी व्यापकता व संग्राहकवृत्ति नसल्यामुळेंच त्यांची अशा प्रकारची मनोवृत्ति होण्यास मदत होत आहे. परंतु सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांच्यामध्यें साहचर्य नाहीं हें म्हणणें जसें पोकळ व अर्थशून्य आहे असें वर सांगितलें त्याचप्रमाणें समाजसुधारणा व धर्माच्या आद्य तत्त्वांचें आचरण यांजमध्यें साहचर्य नाहीं असें म्हणणेंहि तितकेंच भ्रामक आहे असें माझें ठाम मत आहे; मग आपण त्याला किती मान द्यावयाचा असेल तो द्या. वस्तुतः आमच्यासारख्या भावनामय लोकांच्या बाबतींत तर अशा त-हेच्या भ्रामकपणास मुळींच जागा नाहीं. सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी या आध्यात्मिक चळवळी असतात; आपण कोठूनहि सुरुवात करा, शेवटीं एकाच उगमापाशीं जाऊन पोहोंचतो; आणि तो उगम म्हणजे आध्यात्मिक होय. मी ब्राह्मो समाजाच्या तत्त्वावरील आपल्या अलकडील व्याख्यानांत महात्मा गांधी यांना हिंदुस्थानांतील नवयुगाचे जनक जे राजा राममोहन राय त्यांचे नवीन अवतार म्हणून संबोधीत असतों. करितां आपण राजा राममोहन राय व महात्मा गांधी यांचें चारित्र्य व कार्य यांकडे दृष्टि द्या म्हणजे माझ्या विधानांतील भावार्थ आपल्या बरोबर लक्षांत येईल. राजा राममोहन राय यांनीं धर्मापासून सुरवात करून शेवटीं व्यवहार्य धर्माचें सार जें उच्च राजकारण त्यामध्यें आपल्या कार्यक्षेत्राचा शेवट केला; उलटपक्षीं महात्मा गांधींनीं प्रथम राजकारणाच्या प्रवाहांत उडी घातली पण शेवटीं ते प्रस्तुत काळांतील जो उच्चतम धर्म त्याच्या कडेस लागलेले आहेत. ध्येयात्मक प्रयत्नांचें अशा प्रकारचें ऐक्य आहे. या ऐक्याच्या योगानें आमच्या सुधारकांची सुधारणा होऊन व त्यांच्या ध्येयास अधिक उत्कटता प्राप्त होऊ शक्य तितक्या लवकर त्यांच्या प्रयत्नांना यशाचें सुमधुर फल लाभो एवढीच माझी प्रार्थना आहे !

  1. दोन ज्ञानदेव व तीन नामदेव
  2. दारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति?
  3. दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज
  4. तुबायाझा
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
Page 74 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी