1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

चैतन्यचरित्र

चैतन्याचें पूर्वाश्रमाचें नांव विश्वंभर. लाडकें नांव निमै. हा नवद्विप (नदिया) येथें इ. स. १४८६ सालीं वैष्णव ब्राह्मण आईबापांच्या पोटीं जन्मला. ह्याचा आजा मूळ ओरिसा प्रांतांतला राहणारा. संन्यास घेतल्यावर निमै आपल्या जीवनाचें कार्य करण्याला आरंभापासून अखेरपर्यंत ओरिसामधील जगन्नाथपुरी येथें येऊन राहिला, ह्यांत वावगें कांहींच झालें नाहीं. आढ्याचें पाणी वळचणीकडेच उतरावयाचें! निमै लहानपणीं उनाड होता. ठरलेलीच गोष्ट. आपल्यास धरावयास आलेल्या चौ-यांशी हत्यारबंद शिपायांची दरोडेखोर नाम्यानें (नामदेवमहाराजांनीं) कत्तल केली. निमै बंगाली असल्यानें असलीं कृत्यें त्याचेकडून होणें शक्य नव्हतें. तरी तो सहा वर्षांचा होण्यापूर्वींच, गंगेवर स्नानासाठीं ब्राह्मण आले असतां त्यांचीं धोतरें लपवून ठेव; पाणी भरण्यासाठीं मुली आल्या तर त्यांच्याशीं माकडचेष्टा कर, असे अनेक चाळे करूं लागला होता. आईबापांनीं असें करूं नको म्हणून सांगितलें, तर ह्याशिवाय माल जगाचा अनुभव कसा येईल, असा साळसूद जबाब देई. शिकण्यासाठीं शाळेंत जा म्हटलें तर माझें शिक्षण सर्वच चाललें आहे, असें म्हणे. “सर्वत्र अमार (माझें) एक अद्वितीय स्थान” हें वेदान्तांतील वाक्य सांगून त्याचा विद्वान् बाप जगन्नाथ मिश्र आणि साध्वी शचीदेवी आई ह्या दोघांचींहि तोंडें बंद करी. निमै अति गोरा व अति सुंदर बालक होता. त्याच्या ह्या चाळ्यांनीं तर तो सर्वांचा अधिकच लाडका झाला होता. नवद्वीप हा गांव त्या वेळीं पश्चिम बंगाल्यांत संस्कृत विद्येचें मोठें नामांकित आगर होतें. त्यांत लवकरच आपल्या कुशाग्र बुद्धीनें संस्कृत व्याकरणांत त्यानें चांगली प्रगति संपादन केली. मुरारी गुप्त नांवाच्या वैश्य जातीच्या एका संस्कृतज्ञांना त्यानें व्याकरणाचे प्रश्न विचारून कुंठित केलें.

संस्कृत व्याकरण हें कांहीं खोकल्यावर किंवा अजीर्णावर औषधाच्या पुड्या देण्याइतकें सोपें काम नाहीं, असा टोमणा मारला. गदाधर नांवाच्या एका नैय्यायिक ब्राह्मणालाहि तर्कशास्त्रांत हलवून थक्क केलें. तरुणपणीं त्यानें संस्कृत शिकविण्याची स्वत:ची एक स्वतंत्र पाठशाळा उघडली, आणि पांडित्यांत नांव मिळविलें पण ह्या कोवळ्या वयांत त्याच्या भक्तीचा अंकुर मात्र अगदीं दडून राहिल्यामुळें दिसून आला नाहीं. धार्मिक लोकांचीहि तो इतर कोरड्या शास्त्री-पंडितांप्रमाणेंच प्रसंगीं चेष्टा करी; पण भक्तिरसाचा ज्वालामुखी त्याच्या पोटांत धुमसत असलेला फार दिवस असा गुप्त राहणें शक्य नव्हतें. ख-या भक्तीच्या पोटीं ज्ञान आणि वैराग्य ही जुळीं व्हवयाचींच, हें आम्हीं गेल्या व्याख्यानांत जाणलेंच आहे.

निमैमध्यें ज्ञान तर होतेंच; पण तारुण्याच्या ऐन ज्वानींत त्याच्यामध्यें वैराग्यहि डोकाऊं लागलें. तो गयेस आपल्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त निघाला असतां, वाटेंत कुमार हट्टा येथें ईश्वरपुरी नांवाच्या म्हाता-या साध्या सात्त्विक ब्राह्मणास भेटला; त्याच्या निर्व्याज शुद्ध भक्तीच्या साक्षात्कारामुळें निमैच्या भक्तीचा जो एकदा स्फोट झाला तो पुढें त्याला स्वत:ला देखील कांहीं आवरेना. गया क्षेत्रांत त्याला भक्तीचा आणखी साक्षात्कार घडून एकदा तर तो मूर्च्छित पडला. त्यानें यात्रेहून परत गेल्यावर संन्यास घेतला. कारण हिंदु धर्माचीं खुळचट जातिभेदाचीं बंधनें त्याला फार दु:खद होऊं लागलीं. म्हणून अगदीं तरुणपणीं कोणाचें कांहीं न ऐकतां, संन्यास घेऊन पुरी येथील जगन्नाथाच्या देवळांत जाऊन राहिला. तेथील देवळाच्या आवारांत त्याच्या भक्तिभावनांना पूर्ण अवसर मिळून शिवाय जातीचें कसलेंहि बंधन पाळावें लागत नसे. तेथें त्याला पुष्कळ शिष्यसमुदाय मिळाला. कांहीं शिष्यांसमावेत त्यानें हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व क्षेत्रांची यात्रा आटोपली. इ. स. १५११ सालीं पुरी येथें तो परत आला. वृंदावनांत सहा वर्षें राहिल्यावर त्याच्या भक्तीची परमावधि झाली. इ. स. १५१६ चे सुमारास पुरीस परत आल्यावर तेथून १८ वर्षें आपलें धर्मप्रसाराचें काम सतत केलें. सर्व बंगालभर त्याचे शिष्य व त्याच्या वैष्णव मतांचा फैलाव झाला. पुरी येथें इ. स. १५३४ सालीं त्यानें देह ठेविला.

चैतन्य पंथाची भूमिका

द्राविड देशांत उत्पन्न झालेला नवीन भक्तिरसाचा लोट बंगाल देशांत पोंचावयास अवकाश लागला. कारण त्याला मध्यंतरीचे कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र हे देश भिजवावयाचे होते. रामानंद आणि कबिरानें वायव्येकडचे हिंदुस्थानी प्रदेशहि भिजवले. चहुकडची जमीन अशा आत्मिक द्रवानें द्रवली असतां, जात्याच मेण्यासारखी मऊ आणि भुसभुसीत अशी बंगालची जमीन आतां भिजल्याशिवाय कशी राहणार? बंगाल, बिहार, पंजाब, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, द्राविड इ. प्रांत हे केवळ भूगोलाचे निरनिराळे तुकडे नसून तीं परस्पर भिन्न ऐतिहासिक तुकडे ऊर्फ राष्ट्रें आहेत. त्यांची मनोरचना, ऐतिहासिक विकास, हीं परस्परांहून इतकीं भिन्न आहेत कीं, तितकी भिन्नता हल्लीं एकमेकांच्या छातीवर बसून एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास टपलेल्या इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि रशिया या यूरोपीय राष्ट्रांमध्येंहि नाहीं. विशेषत: बंगाल हें एक अगदीं भिन्न आणि ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीनें पाहतां एकजात विशिष्ट संस्कृतीचें स्वतंत्र राष्ट्र आहे. बौद्ध धर्माच्या संस्कृतीखालीं येण्यापूर्वीं बंगालची एक विशिष्ट संस्कृति होती. तिचा आर्यांच्या किंबहुना दक्षिणेच्या द्राविडांच्या संस्कृतीशीं फारच थोडा आनुवंशिक संबंध होता. बंगाल हें शाक्त धर्माचें व तज्जन्य संस्कृतीचें एक मोठें माहेरघर होतें. बंगालनें बौद्ध धर्म स्वीकारला, पण बुद्धानंतर पांचसातशें वर्षांनीं बौद्ध धर्माच्या महायान पंथाला बंगालनें पुन: आपलें शाक्त धर्माचें तांत्रिक स्वरूप दिलें. इतकेंच नव्हे तर हा सशक्त आणि भावनामय तांत्रिक स्वरूपाचाच हल्लींच्या अखिल भारतवर्षावर अल्पसंख्याक आर्यांच्या बुद्धिमय पण दुबळ्या मांत्रिक स्वरूपापेक्षांहि कितीतरी पटीनें अधिक जास्त परिणाम झाला आहे! आर्यांचें मानसिक लक्षण म्हणजे तात्त्विक आणि तार्किक बुद्धिवैभव, द्रविडांचें हिशेबी आणि व्यावहारिक बुद्धिवैभव, मोंगलांचें उज्ज्वल भावनावैभव, अशीं हीं आनुवंशिक राष्ट्रीय लक्षणें ढोबळ मानानें सहज दिसून येण्यासारखीं आहेत. दक्षिणेंतून आलेल्या भक्तीची ठिणगी बंगालच्या भावनामय सुरुंगावर पडल्याबरोबर जो एक सर्व बंगालला हादरून टाकणारा स्फोट उडाला, त्याचेंच नांव श्रीचैतन्यदेव ! हा सुरुंग कोणीं कसा उडवला होता?

बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम वगैरे ईशान्येकडील मानववंश हे सर्व मोंगली संस्कृतीचे आहेत. प्रत्यक्ष गौतमबुद्ध आणि महावीर वर्धमान हेहि थोडेबहुत ह्याच संस्कृतीचे होते. गौतम बुद्धानें टाकलेल्या ठिणगीनें ह्या प्रांतीं २५०० वर्षांपूर्वीं जो स्फोट झाला त्यानें सर्व जग हादरलें आणि सर्व जगभर भागवत धर्माचा ओघ लाव्हासारखा पसरूं लागला. तो थंड होण्याला १०००|१५०० वर्षें लागलीं. चैतन्यदेवाच्या उदयाचे पूर्वीं हा लाव्हाचा (तत्परस) ओघ अगदीं थंड होऊन जमिनीखालूनच वाहात होता. मुसलमानांच्या कापाकापीनें बौद्ध भिक्षु संघाची वाताहात झाली. मागें मात्र त्यांचे केवळ अत्यंत हीन परिणाम तांत्रिक वामाचाराच्या रूपानें समाजाच्या सर्व वर्णांमधून रोमरोमांत भिनून गेले होते. बंगालची स्थिति कमालीची केविलवाणी झाली होती. बुद्धि पूर्ण स्वार्थी झाली होती. एके काळीं पराक्रम गाजविलेल्या सेन घराण्याचा जरठ राजा लक्ष्मणसेन राज्य करीत असतां अवघ्या ५०० मुसलमानांच्या एका दरोडेखोर टोळीनें छापा घातला. तेव्हां त्याला तोंड न देतां लक्ष्ममसेन मागील दारानें परागंदा झाला, आणि त्याच्या मागोमाग स्वातंत्र्य आणि स्वराज्यहि पळालें, तें अद्यापि पूर्वस्थळाला आलें नाहीं. आतां परिस्थिति बदलत आहे. आजकालच्या हिदुंस्थानाला जें भावनांचें भातुकें मिळत आहे, तें  बंगाल्यांतूनच येत आहे. राममोहन राय हा आजच्या भारताचा धार्मिक बाप असेल, तर श्रीचैतन्य हा आजा होय.

चालू स्थिति

भोरच्या सचीवशाहीची दौलत गेल्या सालच्या वार्षिक रिपोर्टांत दाखल केल्याप्रमाणें अवघी सात लाखांची. मुंबईंतील कांहीं मोठे गिरणीवाले ह्यांच्यापेक्षां खात्रीनें अधिक श्रीमंत आहेत. संस्थानची वट्ट लोकसंख्या १३०,४२०. नुसत्या पुणें शहरची, अधिक भरेल. क्षेत्रफळ ९२५ चौरस मैल. पुणें जिल्ह्याचें ५३५० चौ. मैल आहे. पुण्याचे कलेक्टर तेच भोरचे अधिराजे. हें भोरचें थोडक्यांत वैभव आहे. तरी ह्या लहानशा राजवटीबद्दल आम्हाला फार आदर वाटतो. कां कीं अव्वल मराठेशाहीच्या किल्ल्याची ही गादी म्हणजे एक तेजस्वी बुरूज होता. पण ही गतगोष्ट झाली. १० वर्षांपूर्वीं भोरशाही म्हणजे बेबंदशाही असा लौकिक झाला होता. पण भाटकर आणि हिरडा हीं दोन जुलमाचीं प्रकरणें आम्हां परस्थांच्या कानांवर वेळोवेळीं आलीं आहेत. प्रत्यक्ष यजमानांबद्दल त्यांच्या प्रजेंत बेदिली उत्पन्न करण्याची आमची मुळींच इच्छा नाहीं. परंतु त्यांचे साथीदार नोकरशाही, हिची कार्यक्षमता पाहूं गेल्यास ती मात्र मुळींच दिसून येत नाहीं. नुसता वार्षिक रिपोर्ट लिहिण्याबद्दल ह्या परिषदेच्या पहिल्या अध्यक्षास खालील उद्गार काढावा लागला : “जर हा असा पुढील सालीं पाठवाल तर त्या रिपोर्टाच्या प्रती छापून त्या पायाखालीं तुडवून टाकूं असें सांगणें स्पष्ट आहे.” ह्या भीतीनें पुढील सालचे रिपोर्ट प्रजेस वाचावयासच मिळेनात असें ऐकतों. गेल्या सालच्या रिपोर्टांतील जमाखर्चांत वट उत्पन्न ७ लाखांचें दाखविलें आहे. त्यापैकीं ७० हजार खासगी खर्चाकडे लागतें, अशी कबुली आहे. पण शिवाय १३ हजार दिल्लीला जाण्याबद्दल, ५ हजार नवीन बंगल्यासाठीं, ८ हजार पाहुण्यांसाठीं वगैरे खर्चाचे आंकडे आहेतच. शिवाय गुप्त खर्चाचा बोजा दौलतीवर पडत असेल तर तो निराळाच. परवांच्या एका ‘केसरी’च्या अंकांत मिरजकरानें आपल्या खासगी खर्चाचा आंकडा ८४ हजार म्हणून प्रसिद्ध केला असतांना तेथील चित्रगुप्तानें तो खरोखऱी २ लाखांवर जात आहे अशी ओरड केली आहे. भोरच्या चित्रगुप्ताला ह्या प्रकरणीं न विचारणेंच बरें. एकंदरींत संस्थानांत प्रजेच्या आरोग्यखातीं सारें ९३४ रु. ८ आ. ३ पै. असा खर्च दाखविला आहे. पण खाशांच्या एका ऍपेंडिसयाइटिस् ऑपरेशनवर ४|| हजारांचा खर्च दाखविण्यांत आला आहे. ५ हजारांची एक मोटार तर ३|| हजारांचा डिलिव्हरी खर्च. हा डिलिव्हरी खर्च मोटारचा किंवा राजवाड्यांतील एखाद्या बाळंतपणाचा कळत नाहीं. संस्थानचा वट पब्लिक वर्क्सचा खर्च ६१ हजार रुपयांचा आहे. नवीन बंगल्यावर ह्यासालीं ५ हजार खर्च झाला आहे. या न्यायानें प्रजेच्या गरजा आणि खाशांच्या गरजा आणि त्यांचा गुजारा कसा होतो यांचें प्रमाण कळतें. उघड जमाखर्च जर असा अनागोंदीचा आहे, तर गुप्त कारभार किती असह्य असेल हें चित्रगुप्तच जाणें. जावें त्यांच्या जन्मा तेव्हांच कळे. तरी ही स्थिति १० वर्षांपूर्वींपेक्षां कितीतरी बरी असें म्हणतात. कारण हल्लीं तेथें प्रजेतर्फें एक कौन्सिल आहे असें ऐकतों. लग्नटक्का, घरवण, म्हैसपटी, पाटदाम, वगैरे हास्यास्पद कर बंद झाले आहेत. असल्या क्षुद्र सुधारणाबंद्दलहि आम्ही श्रीमंतांचे आभारी आहोंत. हल्लींचे यजमान हे खुल्या दिलाचे आणि बहुश्रुत आहेत. ते नुकतीच विलायतची यात्रा करून आले आहेत. भावी सुधारणाकालांत ते याहून मोठ्या व टिकाऊ सुधारणा करतील अशी आशा आहे. त्यांच्या पत्नी ह्या सुशिक्षित, सुशील व अनेक भाषा जाणणा-या होत्या. त्या नुकत्याच महाबळेश्वरीं स्वर्गवासी झाल्या; हें दुष्ट वर्तमान ऐकून त्यांच्या प्रजेप्रमाणेंच आम्हीहि फार दिलगीर आहोंत. हल्लींचे युवराज हे मोठे विद्वान् मनमिळाऊ व लोकपक्षीय आहेत असें ऐकतों. एकंदरींत ह्या राजघराण्यानें मराठेशाहींतील आपला बोलबाला तर राहो पण नुसतें आपलें अस्तित्वहि टिकवावयाचें असेल तरी चालू काळचीं चिन्हें ओळखावयास त्यानें लवकर शिकलें पाहिजे. राजा म्हणजे विष्णूचा अवतार नसून प्रजेचा एक वतनदार नोकर ही व्याख्या आधुनिक युरोपांतल्या मोठमोठ्या बादशहांनीं विसरल्यामुळें ते गेल्या ५|१० वर्षांत नामशेष झाले; तसें आमच्या जहागीरदारांनीं होऊं नये असें आम्हीं इच्छितों.
शास्त्याप्रमाणेंच प्रजेलाहि आणि तिच्या पुढा-यांना नम्रपणानें आम्ही एक इशारा देऊं इच्छितों. राज्यकर्त्यांना नांवें ठेवणें फार सोपें आहे परंतु त्यांच्या प्रत्येक पापाची जबाबदारी पर्यायानें पाहतां राज्य करवून घेणा-या प्रजेकडे येते, हें आम्ही नेहमीं विसरतों. मनुष्य बैलाला पाठळ करतो, पण सिंहाला भितो. याच न्यायानें शस्ताहि शहाण्या प्रजेचा नौकर आणि मूर्खांचा मात्र राजा होतो. यथा राजा तथा प्रजा हें खरें नसून यथा प्रजा तथा राजा हेंच खरें. बाहेरची तर गोष्ट दूर राहो, ब्रिटिशांनीं जिंकलेल्या हिंदुस्थानांतहि वरील व्यस्त प्रमाण गेल्या वर्षापासून अनुभवास येऊं लागलें आहे! मग तेंच प्रमाण ब्रिटिशांनीं न जिंकलेल्या नामधारी संस्थानी स्वराज्यांत कां अनुभवास येऊं नये बरें?
आजवर १० वर्षांत जी भोर संस्थानांत चळवळ झाली तिचा पहिला हप्ता आतां संपला. अखिल भारतीय साम्राज्यांत पुढील वर्षीं जी शासनघटना होणार आहे तिच्यांतून चिमुकलें भोर संस्थानच एकीकडे वगळलेलें कसें राहील? हें शक्य नाहीं. अधिपतींच्या सदिच्छेनें म्हणा किंवा प्रजेच्या चळवळीनें म्हणा संस्थानची राज्यपद्धतीहि बदलणारच. हल्लीं जें नामधारी कौन्सिल आहे तें पुढें लोकनियुक्त सभासदांचें एक सत्ताधारी संस्था होईल व तिला दिवाणापासून पट्टेवाल्या हुज-यापर्यंत सर्व नोकरशाहीच नव्हे तर प्रत्यक्ष श्रीमंत यजमानहि जबाबदार राहतील. आजचे लोकपुढारी शेट्ये पाटील तुरुंगांत आहेत, ते न जाणों उद्यां ह्या सभेचे अध्यक्ष होतील. पोतनिसांवर खटला चालूं आहे, तर परवां त्यांना मानपत्रें मिळतील. ज्यांच्यावर आतां जुलूम होत आहे अशांना थोड्याबहुत दिवसांनीं मतदानाचा हक्क मिळेल. आणि त्यांनीं निवडून पाठविलेल्या प्रतिनिधींची मनधरणी संस्थानाधिपतींना करावी लागेल. एकीकडे प्रजेच्या प्रतिनिधींचा अंकुश आणि दुसरीकडे साम्राज्यसंघटनेचा (Imperial Federation) दाब अशा कात्रींत श्रीमंतांना ही कटकटीची पोळी नको, सुखाची भाकरी भली, असें होईल ! जबाबदार राज्यपद्धति हे शब्द नसुते ऐकण्यासच बरे आहेत. हल्लींचे नम्र आणि स्वार्थत्यागी शेटे, पोतनीस हे शासनपद्धतीची घडी बदलल्यावर उद्यां तसेंच राहतील कशावरून? मजूरपक्षाच्या रॅम्से मॅक्डोनल्डला तो मजूर असे तोंपर्यंत चहांत घालावयाला साखर मिळत नव्हती पण प्रधान झाल्याबरोबर त्याची नजर फिरली ! आमचे बोल व्यक्तिविषयक मुळींच नव्हेत. लोककल्याण म्हणजे नुसती सनदेची अदला-बदल नव्हे तर शिलाची व अंतःकरणाची पालट होय. ती पालट सावकाश घडत असते आणि ती घडवून आणण्याचें अधिक कठीण काम भावी शेटे पोतनिसांवर अवलंबून आहे. ते कोणीहि असोत, हें काम करोत येवढेंच आमचें म्हणणें आहे.
हल्लींचेंच ब्रिटिश हिंदुस्थान घ्या. त्यांत लोकनियुक्त कौन्सिलें थोड्या प्रमाणांत कां होईनात आहेतच. तेथील कारभार किती मिंधेपणाचा आहे ! केवळ पगारासाठीं भुकेलेल्या नामधारी लोकमंत्र्यांना परकीय नोकरशाही कशी बोटावर नाचविते? हें काय संस्थानिकांनो ! तुमच्या नजरेंत येत नसेल ! खालसांतल्या म्युनिसिपालिट्या, लोकल बोर्डें, युनिव्हर्सिट्या, फार काय पण मोठमोठीं लोकांचीं हॉस्पिटलें, शाळा आणि वसतिगृहें, ह्यांत तर परकीय नोकरशाहीचा हात नसतो ना? मग तीं कितीशीं ख-या दीन-दुबळ्या प्रजेच्या इच्छांना व गरजांना जबाबदार आहेत?  नसल्यास कां नाहींत? कारण तेथें शीलाची अद्याप आलटापालट झाली नाहीं. म्हणूनच महात्मा गांधींसारखे मोठमोठे शासनाचार्य कळवळ्यानें सांगत आहेत कीं, बाबांनो, नुसत्या सनदेची पालट करूं नका. तर शीलाची नव्हे प्रत्यक्ष अंतःकरणाची पालट करा. नुसत्या वचनाची देवघेव करूं नका, तर प्रत्यक्ष हृद्याची करा. ह्या शीलपरिवर्तनकार्याला विधायक कार्य म्हणतात. नुसत्या विक्षोभक कार्यानें औट घटकेचें स्वातंत्र्य मिळेलहि कदाचित्, पण तें कायमचें टिकवावयाचें झाल्यास अगोदर मध्यें आणि नंतर त्रिकालाबाधित विधायक कार्य चालूं ठेवावें लागतें. तसेंच कार्यं भोर संस्थानांत पुढें चालू राहील अशी ह्या परिषदेची इच्छा आहे.
तें कार्य चालूं असतां आतांपर्यंत उत्पन्न न झालेले नवीन प्रश्न अथवा अडचणी उत्पन्न होतील. उदाहरणार्थ, मी येथें एकाच प्रश्नाचा उल्लेख करतों. उत्तर हिंदुस्थानांत जसे हिंदु-मुसलमानवाद हा जातीय प्रश्न प्रत्येक कार्यारंभीं उद्य पावतो, त्याप्रमाणें दक्षिण हिंदुस्थानांत त्याच्याच जोडीला ब्राह्मणब्राह्मणेतरवादाचा प्रश्न उभा राहतो. तो नुसते आम्हीं डोळे झांकल्यानें सुटणार नाहीं. आज १० वर्षें तुम्ही ह्या ब्राह्मणब्राह्मणेतरवादापासून अलिप्त आहां ह्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. पण ह्यापुढची खातरजमा कोण घेईल? पुढील कार्य विधायक आहे, आणि विधायक कार्यांतच अशा प्रश्नांची नड फार येते. मोठ्याशा विक्षोभक कार्यांत ब्राह्मणब्राह्मणेतरवादच काय पण हिंदु-मुसलमानवाद त्या वेळेपुरता पडद्याआड कसा जातो हें वेळोवेळीं कार्यकर्त्यांच्या अनुभवास आलें आहे. असहकारितेच्या पहिल्या सलामींत शौकतअल्लीसारखे कट्टे मुसलमानहि महात्माजींच्या चरणीं लीन झाले. तसेंच गेल्या वर्षींच्या कायदेभंगाच्या रणसंग्रामांत ब्राह्मणब्राह्मणेतर खांद्याला खांदा भिडवून लढले. पण विक्षोभाचा पहिला उमाळा ओसरल्यावर विधायक कार्याला हात घालतों न घालतों तोंच हे वाद पूर्वींपेक्षांहि आपलें अधिक उग्र स्वरूप प्रकट करतात असें आढळून येतें. भोरकरांनों ! सुधारणेच्या भावी घटनेंत तुम्हांला मतदानाचा हक्क मिळाल्यावर प्रतिनिधि निवडून देण्याची किंवा नियुक्त प्रतिनिधींना अधिकार आणि पगार मिळण्याची जेव्हां परीक्षेची वेळ येईल तेव्हां जर बहुजनसमाजाच्या कल्याणार्थ स्वतःच्या लोभाचा आणि स्वजातीयांच्या अभिमानाचा बळी देण्यास तुम्ही तयार व्हाल तरच ह्या जातीय प्रश्नांची कांहींतरी सोडवणूक होईल. येरवीं ते तुमच्या बोकांडीं बसल्यावांचून राहणार नाहींत.

दक्षिण हिंदुस्थानांत जीं थोडीं लहानसान संस्थानें आहेत त्यांचे अधिपति ब्राह्मण किंवा मराठे आहेत. पण नोकरशाही मात्र सर्वत्र एकजात ब्राह्मणांचीच आहे. चळवळे लोक सुशिक्षित वर्गांतूनच येत असल्यामुळें ते ब्राह्मण ऊर्फ सुशिक्षित वर्गाचे असणार. खरी जनता म्हणजे शेतकरी वर्गाची, विशेषतः कामकरी वर्गाची; ती हाडाची अक्षरशत्रु, खेड्यांत राहून उन्हांत काम करणारी, जागी झाली तरी दुस-याच्या पावलावर पाऊल टाकून अनुकरण करणारी, विक्षोभक कार्याला प्रसंगीं अनुकूल होणारी, पण ख-या विधायक कार्याची जबाबदारी न ओळखणारी व ओझें न सहन करणारी अशी आहे. ब्राह्मण अथवा सुशिक्षित वर्ग हा शहरांत राहून सावलींत बसून काम करणारा. मंत्र सांगून दुसरे त्याची अंमलबजावणी करतील अशी वाट पाहणारा. नेतृत्वासाठीं स्वार्थत्याग करणारा पण अनुयायांचें बळ संग्रहीं नसलेला, मानलेल्या सुशिक्षणामुळें ज्यांच्या खासगी गरजा वाढलेल्या आहेत पण त्या पुरवण्यासाठीं आर्थिक आणि शारीरिक संपत्ति नसलेला असा परावलंबी आहे. अशा अनेक कारणांमुळें ब्राह्मणब्राह्मणेतरवाद अथवा सुशिक्षित-अशिक्षितवाद विधायक कार्यांत सहजच उद्य पावल्यास काय आश्चर्य? ब्राह्मणेतरांतील सुशिक्षितांस मी ब्राह्मण समजतों तसेंच ब्राह्मणांतील अशिक्षितांस मी ब्राह्मणेतर समजतों. ही माझी व्याख्या नीट लक्षांत आणून माझ्या टीकाकारांनीं माझ्या म्हणण्याविषयीं विनाकारण गैरसमज करून घेऊं नये.

चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी

चातुर्मास्याचा इतिहास चमत्कारिक आहे. बौद्ध, जैन आणि ब्राह्मणादि पंथांचे परिव्राजक पूर्व काळीं अखिल भारतांत हिंडत. पावसाळ्याचे चार महिने कोठें तरी विहारांत राहात. तेव्हां आसपासचे श्रावक जन त्यांचेकडे उपासनेस जात. पौर्णिमा, अमावास्या, दोन अष्टम्या हे महिन्यांतून चार दिवस उपोसथाचे ठरलेले असत. उपोसथाचा अर्थ उपोषण असा वैष्णव पंथानें केल्यावर ह्या चार तिथींच्या ऐवजीं दोन एखादशा झाल्या. आषाढ शुद्ध एकादशीपासून तों कार्तिक शुद्ध द्वादशीअखेर चार महिने पावसाळ्याचें चातुर्मास्य जें हल्लीं प्रचारांत आहे, तें भागवत काळापासून चालत आलें आहे. श्रावण पौर्णिमेला बौद्ध भिक्षूंना नवीन चीवर वस्त्रें देण्याचा किंवा ब्राह्मणांना यज्ञोपवीतें (जानवीं) देण्याचा मोठा विधी असे. ह्या पुनिवेला पोवती, राखी, दोरे इत्यादि देण्याचीं किंवा घालण्याचीं जीं व्रतें बायकांत पसरलीं, त्यांचें कारण सापाचें विष बाधूं नये, स्वकीय परकीय असा भेदभाव राहूं नये, सुंदर अर्भकांना किंवा तरुण स्त्रीपुरुषांना दृष्टीदोष घडूं नये, आपला भाऊ आणि नवरा दीर्घायु व्हावे इत्यादि भोळ्या भावाचे तांत्रिक तोडगेच होत. ते महायान बौद्ध धर्मांतून किंवा प्राचीन शैव तंत्रमार्गांतून आले आहेत. पोटाळलेल्या साधु, गोसावी, भटें वगैरेकडून ह्याच चातुर्मास्यांत विशेषतः बायकामुलांमध्यें अशा तोडग्यांना ऊत आणला जातो पण ख-या भागवत किंवा ब्राह्म धर्माला हे तोडगे विरोधक आहेत, हें तुकारामांनीं खालील अभंगांत सांगितलें आहे.
आली सिंहस्थ पर्वणी | न्हाव्यां भटां झाली धणी ||१||
अंतरीं पापाच्या कोडी | वरी वरी बोडी डोइ दाढी ||२||
बोडिलें तें निघालें | काय पालटलें सांग वहिलें ||३||
पाप गेल्याची काय खुण | नाहीं पालटले अवगुण ||४||
भक्ति भावें विण | तुका म्हणे अवघा शीण ||५||
व्रतें आणि तोडगे केवळ मतलबासाठीं करण्याचा तुकारामांना वीट होता. इतकेंच नव्हे तर क्षुद्र देवतांचीहि मात्रा तुकोबाजवळ चालत नव्हती. त्यांना क्षुद्र म्हणणारे महापंडित व पदवीधर देखील खालील देवांच्या नांवांवर राष्ट्रीय उत्सव आजकाल चालवीत आहेत. त्या सर्व देवांचा तुकारामांनीं किती रोकडा निषेध केला आहे, तसा कोणी तरी लोकसंग्रहकर्ते आज करीत आहेत काय?
नव्हे जाखाई जोखाई | मायराणी मणाबाई ||१||
बळिया माझा पंढरीराव | जो या देवांचाहि देव ||२||
रंडी चंडी शक्ति | मद्य मांसारें भक्षिती ||३||
बहिरव खंडेराव | रोटी सुटी साठीं देव ||४||
गणोबा विक्राळ | लाडू मोदकांचा काळ ||५||
मुंजा म्हैसासुरें | हे तो कोण लेखी पोरें ||६||
वेताळें फेताळें | जळो त्यांचें तोंड काळें ||७||
तुका म्हणे चित्तीं | धरा रखुमाईचा पति ||८||
ह्या चतुर्मास्यांत न्हाव्यां-भटांची जी धणी होत आहे, ती बायकांकडूनच नसून मतलबी आणि राष्ट्राच्या नांवानें पोत पाजळणा-या पदवीधरांकडूनहि ती होत असते. विशेषतः भाद्रपद मासांत स्वतःच्या आयाबहिणींचाहि उद्धार देशभक्तांच्या अव्वल आखाड्यांत आतां लवकरच सुरू होईल. तुकारामांच्या धर्माला संताळ्याचा धर्म म्हणून हांसणारे महाराष्ट्र सारस्वतभक्त व संशोधक अलीकडे पुस्तकें लिहून पोट भरीत आहेत पण अशांचा मतलबसिंधु तुकाराम ओळखून काय म्हणतात तें पाहा :-
ओनाम्याच्या काळें | खडे मांडविले बाळें ||१||
तेचि पुढें पुढें काई | मग लागलिया सोई ||२||
रज्जु सर्प होता | तोंवरीच न कळतां ||३||
तुका म्हणे साचें | भय नाहीं बागुलाचें ||४||
राष्ट्रधर्माची कड घेऊन अलीकडील रा. भावे ह्यांच्यासारख्या संशोधकांनींहि तुकारामांना नांवें ठेविलीं आहेत. वटसावित्रीला यमाचा बागुलबोवा दिसून ती भ्याली. तसे हे आजकालचे ओनामा पंडित मुसलमानांना भिऊन गणोबाच्या भजनीं लागले आहेत. तुकारामांवर टीका करून आपण विद्वान म्हणवीत आहेत. पण तुकाराम त्यांच्या धर्माला बागुलबोवाचा धर्म म्हणत आहेत ! असल्या धर्माला खडे ठेवून मुलांना हिशेब शिकविण्याप्रमाणें ख-या भक्तांनीं कमअस्सल ठरविलें आहे. जोंवर कळत नाहीं, तोंवरच दोरी सापाप्रमाणेंच भिवविते, असें तुकोबा म्हणतात. त्यावरून परिणत अवस्थेंत पंढरपूरची मूर्तभक्तिदेखील त्यांना अपुरी वाटली असावी, येरवीं पुढील अभंग त्यांनीं केला नसता.

मनोमय पूजा | हेचि पढीये केशी राजा ||१||
घेतो कल्पनेचा भोग | न मानेचि बाह्यरंग ||२||
अंतरीचें जाणें | आदि वर्तमान खुणें ||३||
तुका म्हणे कुडें | कोठें सरे त्याच्यापुढें ||४||
मनोमय पूजा केशीराजाला पढीय म्हणजे प्रिय आहे, म्हणून तुकाराम बाहेरच्या रंगाला मानीत नाहींत. ते भक्तीच्या खुणेनें आदिवर्तमान ओळखतात. पण आम्ही इतिहाससंशोधक मात्र कोंबड्यासारखे उकिरडाच उकरीत आहोत ! नम्रता व भक्तिभाव ह्याशिवाय इतिहाससंशोधक काय, कीं सत्यशोधक काय, कोणीच होऊं शकत नाहीं !
चातुर्मास्याचें आणखी एक गुळचट लक्षण आहे, तें हें कीं, ह्या महिन्यांत जितके उपास असतात, तितक्याच मेजवान्याहि असतात. त्यामुळें गोडघाशेपणा वाढला आहे. एकादशीची गुडधणी आणि द्वादशीची पुरणपोळी ह्या दोहींवर हक्क सांगणारे हरीचे लाल ह्या चातुर्मास्याचे शेवटीं लठ्ठ होतात; बिचा-या बायकांच्या हाताला मात्र तेलाच्या लाटलाटून घट्टे पडतात ! जोशी बिल पास झालें त्यामुळें फार तर ग्रामजोशी नष्ट होतील. घरोघरीं गोडावलेलीं पोटें पुष्टच होणार त्यांची काय वाट? लहानपणीं मी एकदां माझ्या आईचे माहेरचे खेड्यांत गेलों होतों. तेथील कुलकर्ण्याचे घरीं श्रावण मासांत रोज पुरणाचें जेवण बिनचूक होत असें. सोमवार शिवाचा, मंगळवार गौरीचा, शुक्रवार लक्ष्मीचा, बुधवार विठोबाचा, गुरुवार दत्ताचा, शनिवारीं शनीसंतर्पण आणि रविवारीं त्याचा बाप जो सूर्य त्याच्या नांवानें आराधना ! श्रावणांतील एकादशीच्या दिवशीं देखील बायकांना पुरण घालावेंच लागे. खेड्यांत एकच जरी ब्राह्मणाचें घर असलें, तरी बाहेर गांवाहून ब्राह्मण सवाष्णी आणावी लागत असे, आणि दुष्काळांतहि हा कुळाचार चालविणें भाग पडे ! असा हा चातुर्मास्यांतल्या क्षुद्र दैवतांचा महिमा आहे ! तो वर्णन करण्यास ब्राह्मण हरिदासाशिवाय कोण समर्थ आहे ! पण तुकारामांनीं मात्र त्यांचें खरें मर्म वरील अभंगांत अचूक ओळखलें आहे.
चातुर्मास्याचा हा दुसरा महिना केवळ सुखजीवी सावलींतल्या लोकांतच दिसतो. खेड्यांतील श्रमजीवी बहुजनसमाजाला गूळ मिळतच नाहीं, मिळाला तरी त्याची चट नाहीं. त्यांना तो समाज ताकावर तृप्त राहून, शहरांतील सुखजीवी लोकांचे सण आणि व्रतें साजरीं करण्यासाठीं तूप, तांदूळ, गहूं, गूळ हे पदार्थ विपुल पुरविण्याच्या कामीं चार महिने सारखा रानांत खपत असतो. ऐतखाऊ लोक दिवसा हा खादाडधर्म आचरून, रात्रीं गांवांत राहून कथाकीर्तनें, गोंधळ, जागरणें, पोथीपारायणें, ह्यांत आपला मोक्ष हुडकीत असतात. पण तुकाराम आपल्या कीर्तनांत कोणत्या रसाची प्रौढी मिरवितात तें पाहा !
घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं ।।
मुक्ता आत्मस्थिति सोंडवीन ।।१।।
ब्रह्मभूत काया होत असे किर्तनीं ।।
भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ।।२।।
तीर्थ भ्रामकासी आणीन आळस ।।
कडू स्वर्गवास करिन भोग ।।३।।
सांडवीन तपोनिधा अभिमान ।।
यज्ञ आणि ज्ञान लाजवीन ।।४।।
भक्ति भाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ ।।
ब्रह्मींचा जो अर्थ निज ठेवा ।।५।।
धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।।
भाग्य आम्हीं तुका देखियला ।।६।।
पण ही सर्व प्रौढी रा. भावे ह्यांच्यासारख्या सारस्वतभक्ताला काय होय ! त्यांनीं आपल्या ‘महाराष्ट्र सारस्वताच्या’ नव्या आवृत्तीच्या ३५८।३५९ पानावर तुकाराम आणि रामदास ह्यांच्या ध्येयांची तुलना करून १२ कलमांत तुकारामांची निंदा व रामदासांची स्तुति केली आहे, ती त्यांच्याच शब्दांत अशी आहे.
१ तुकाराम संसारांत गुरफटला : रामदास विरक्त !
२ तु. संकटें डौलानें सांगतो : रा. ब्रहि काढीत नाहीं !
३ तुकारामाला शेवटीं काळजी बायकोची : रामदासाला शिवाजीची !
४ तु. अडाणी : रा. आचार्य !
५ तु. राजकारण नाही : रा. मुत्सद्दी !
६ तु. लंगोटीची आवड : रा. गाढवाचा तिरस्कार !
७ तु. पंढरीपलीकडे गेला नाहीं : रा. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत ११०० मठ स्थापिले !
८ तु. दैववादी खुळसट : रा. प्रयत्नशाली वीर !
९ तु. परंपरेंत रुतलेला : रा. नव्या वाटा पाडिल्या !
१० तु. शिष्यांवर दाब नसे : रा. खरमरीत शासन करी !
११ तु. जगाला उपदेश : रा. महाराष्ट्रापुढें जग अल्प !
१२ तु. रानांतला टाळकुट्या : रा. चें ध्येय “महाराष्ट्रानें आनंदवनांत सिंहासनावर बसून चांडाळ बडवावें”
असल्या सत्यशोधापुढें भागवतधर्मानें काय रडावें !  वरील अभंगांतील कुठें तुकोबारायाची प्रौढी, कुठें असलें हें इतिहाससंशोंधन ! जुन्या खेडवळ ब्राह्मणांची चातुर्मास्यांत चंगळ, तर नवीन नागर ब्राह्मणांची शहरांतून नित्य दिवाळी ! तुकाराम प्रत्यक्ष ब्राह्मज्ञान्यालाहि लाळ घोटावयाला लावीत आहेत, तर हे भटजी आजकालच्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा कोळसा उगाळून त्याचा टिळा प्रत्यक्ष तुकारामांच्याच कपाळाला लावूं पाहात आहेत !  म्हणूनच आपल्या अनुयायांस अगदीं शेवटला उपदेश खालील अभंगाचे द्वारा करून तुकाराम हा हतभागी देश सोडून गेले !
ऐका ऐका भाविक जन । कोण कोण व्हाल ते ।।
तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ।।
नका शोधूं मतांतरें । नुमगें खरें बुडाल ।।
कलीमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ।।१।।

चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर

“शेतक-यांचा स्वयंनिर्णय”
आजची ही परिषद अगोदर तुमची, निदान तुमच्या तालुक्यापुरती तरी संघटना करून मग तुमच्यांपैकीं कोणातरी पुढा-यास अध्यक्ष नेमून मजसारख्या बाहेरच्यांना केवळ सल्लागार म्हणून बोलावलें असतें तर मीं नाकारलें नसतें. तसें न करतां मला पुनः पुनः आग्रह करून आणिलें, म्हणून मीं नाइलाजानें आलों आहे. शेतक-यांची चळवळ ह्यापुढें बाहेरच्यांवर कोणत्याहि कारणांवरून अवलंबून चालणार नाहीं. इ. स. १९२८ च्या ऑगस्टमध्यें पुण्यास, मुंबई इलाख्याच्या शेतक-यांची जमिनीच्या तुकडे बिलाला कसून विरोध करण्याकरितां तांतडीनें एक मोठी परिषद भरविण्यांत आली. त्या वेळीं मीच अध्यक्ष होतों. त्यानंतर मी ताबडतोब पश्चिम आणि पूर्व खानदेश, नाशिक, उमरावती, नागपूर येथें शेतक-यांच्या सभा भरवून, शेतक-यांच्या प्रश्नासंबंधीं जागृति करण्याचा प्रयत्न केला. १९३० सालची हकीकत आपल्यास विदितच आहे. जुन्नर, खेड, हवेली, सासवड वगैरे तालुक्यांतून जवळ जवळ प्रत्येक खेड्यांतून आम्ही हिंडलों. त्यानंतर अहमदनगर व सातारा जिल्ह्यांत हिंडलों. विशेषतः सातारा जिल्ह्यांतील वाळवें तालुक्याची परिषद संघटनेच्या कार्यासाठीं बोरगांवास भरविली. एकंदरींत महाराष्ट्रांतील ह्या सहा जिल्ह्यांतील परिस्थिति मला आतां प्रत्यक्ष अवगत आहे. शेतक-यांत गेल्या दोन वर्षांत जरी अभूतपूर्व जागृति घडली आहे, तरी त्यांच्या संघटनेच्या कार्याला अद्यापि व्हावी तशी नुसती सुरुवातहि झाली नाहीं, असें मला स्वानुभवावरून अगदीं कष्टानें म्हणावें लागत आहे. आणि ह्यापुढें तर दिवसेंदिवस हें कार्य अधिक कठीण, स्वार्थत्यागाचें व धाडसाचें होणार, ह्यांत मला तर तिळमात्र शंका नाहीं.

  1. चळवळीचा कोंडमारा
  2. गुरु गोविंदसिंग
  3. गुप्तांचा काळ
  4. क्रियापदांच्या विभक्ति
  • 73
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
Page 78 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी